मराठी साहित्य – विविधा ☆ सुख ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ सुख ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

सुख कोणी पाहिले आहे का?

सुख म्हणजे नक्की काय, कोठे मिळते सुख?

सुखाच्या कल्पना आणि सुखाची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असते.

मला बरेचदा हा प्रश्न पडतो की सुख म्हणजे नक्की काय? कोठे मिळते ? शांत पणे विचार केल्यावर लक्षात आले की सुख तर आपल्याला प्रतेक टप्प्यावर मिळते ते आपण कस स्वीकारतो हे आपल्यावर आहे.

प्रत्येकाच्या अपेक्षेप्रमाणे त्याचे स्वरूप बदलत जाते.काहीना खूप पैसा, अफाट संपती नोकर चाकर, भरपूर दागदागिने ऐशोआराम म्हणजे सुख. तर काही लोकांना आपल्या मनासारखे वागवून घेणे, आपली सत्ता गाजवणे, मी म्हणीन ते आणि तसच ह्यात सुख मिळते.

प्रतेक जण आपापल्या वया अनुसार सुख शोधत असतात.

तान्हं मूल आईच्या कुशीत. तर शाळकरी मुलं आपल्या मित्र मैत्रिणींच्या घोळक्यात.

काहींना प्रत्येक  गोष्ट जींकण्याची नशा असते त्यांना त्यातच सुख मिळते. प्रत्येकाच्या सुखाच्या व्याख्या कल्पना वेगळ्या वेगळ्या असतात. माझ्या मते,

श्रम केल्या नंतर गादी वर पडल्या पडल्या शांत झोप लागणे म्हणजे सुख.

गरम गरम वरण भात खाऊन दिलेली तृप्तीची ढेकर म्हणजे सुख.

रणरणत्या उन्हात अचानक मिळालेली झाडाची सावली म्हणजे सुख.

एखाद्या व्यक्तीला मदत केल्यानंतर त्याच्या चेहर्‍यावरचे समाधान म्हणजे सुख.

वेदनांचा दाह कमी होण्या साठी कोणी मायेने हात फिरवणे म्हणजे सुख.

आपल्या जोडीदाराने मी आहे, हो पुढे हे ऐकणे म्हणजे सुख.

लेकीने आई तू दमलीस, अस म्हणत गरम पोळी करून वाढणे म्हणजे सुख.

आजी आजोबांनी नातवंडांवर केलेली माया म्हणजे सुख.

बापरे किती गोष्टीतून आपल्याला सुख मिळत असते नाही का??

मग आपण सुख का शोधत फिरतो असाच आलेला मनात एक प्रश्न

 

सहज मनाच्या कोपऱ्यातून ☺️

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

10.08 20202

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कळतंय पण ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

☆ विविधा ☆ कळतंय पण ☆ डॉ मेधा फणसळकर☆ 

\गेल्या महिन्यात वर्तमानपत्रात “मौजमजेसाठी युवाईकडून ‛वाट्टेल ते’ …”ही बातमी आली होती.  काही अल्पवयीन मुले डुप्लिकेट चावी वापरुन एका व्यक्तीची रेल्वेस्टेशनवर दिवसभर पार्किंग केलेली गाडी फिरवायचे व संध्याकाळी पुन्हा जागेवर नेऊन ठेवायचे. शिवाय हल्ली काही तरुणांमध्ये अशा डुप्लिकेट चाव्या वापरुन गाड्या चोरण्याचे प्रमाण वाढले आहे असेही त्यात  म्हटले होते. परंतु या बातमीतच चौकटीमध्ये मांडलेला विचार मला जास्त महत्वाचा वाटला . “अशी कृत्ये करणाऱ्या मुलांच्या  पालकांवर आधी गुन्हा दाखल केला पाहिजे किंवा या मुलांना अल्पवयीन असूनही योग्य ती शिक्षा झाली झाली पाहिजे.”

मुळात मुलांना योग्य वयात आल्याशिवाय हातात गाडी देणे ही चूक आहे हेच  पालकांना पटत नाही. आज अनेकदा बऱ्याच पालकांना आपली मुले “लहान वयात उत्तम गाडी चालवतात” ही आत्मप्रौढी मिरवण्यात धन्यता वाटते. वास्तविक ज्यावेळी 18 वर्षे ही स्वयंचलित गाडी चालवण्याचे वय ठरवले आहे त्यामागे काहीतरी शास्त्रीय  अभ्यास आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. समजा तुमच्या दहा ते बारा वर्षाच्या मुलाला किंवा मुलीला हातात पैसे देऊन संपूर्ण घरखर्च चालवायची जबाबदारी दिली तर ते योग्य होईल का ?  तीच गोष्ट गाडी चालवण्याच्या बाबतीत आहे. कदाचित या मुलांची शारीरिक क्षमता परिपूर्ण असेल , पण मानसिक क्षमतेचे काय? सिनेमात बघून ‛धूम’ स्टाईल गाडी चालवणे इतकाच मर्यादित अर्थ वाहन चालवण्याच्या बाबतीत त्यांच्या दृष्टीने असतो. त्याच्या परिणामांची पर्वा या वयात त्यांना नसते.

अगदी दोन दिवसांपूर्वीच माझ्या डोळ्यासमोर एक प्रसंग घडला. रहदारीच्या रस्त्यावरुन एक स्कुटर सरळ जात होती. त्याच वेळी एका 15 ते 16 वर्षाच्या मुलाने एका दुकानासमोर पार्क केलेली आपली स्कुटर काढली. त्याच्या कानाला हेडफोन होते व तो गाणी ऐकत होता. त्या नादात समोरुन येणारी गाडी त्याला दिसली नाही व दोन्ही गाड्या एकमेकींवर आपटल्या. सुदैवाने दोन्ही गाड्यांचा वेग जास्त नसल्याने कोणताही गंभीर प्रकार घडला नाही. पण असे काही घडले असते तर ? हा त्या वयातील मानसिकतेचा, अपरिपक्वतेचा परिणाम नाही काय?

एकंदरीतच पालक म्हणून सर्वच गोष्टींमध्ये आपले मूल प्रवीण असावे अशी आपली धारणा झाली आहे. त्यामुळे केवळ स्पर्धेपोटी आपण शिक्षण, क्रीडा, कला किंबहुना सर्वच क्षेत्रात आपल्या मुलांना घुसमटून टाकत आहोत का? किंवा अकाली त्यांच्या हातात स्वयंचलित वाहने, अँड्रॉइड फोन, लॅपटॉप यासारखी उपकरणे देत आहोत का? हल्ली एखादे पाच- सहा महिन्यांचे मूल सुद्धा मोबाईल हातात घेण्यासाठी हट्ट करते.त्याने नीट खावे म्हणून मोबाईल दाखवला जातो. त्यामुळे काहीही भरवताना तो मोबाईलशिवाय तोंडात घास घेत नाही. ही परिस्थिती अनेक ठिकाणी दिसते. वास्तविक सुरवातीला आपणच ही सवय लावल्यामुळे हे होत असते. त्यामुळे जे साध्य व्हावे असे आपल्याला वाटते त्याऐवजी  बूमरँगसारखी ती आपल्यावरच उलटत आहेत. याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. याचा अर्थ ही उपकरणे मुलांनी वापरु नये असा नसून ती क्षमता त्यांच्यात निर्माण झाल्यावर जर ती त्यांना दिली तर  ते हाताळण्याची प्रगल्भता त्यांच्यात येईल.

अर्थात काहीजण असेही समर्थन करतील की आमची मुले लहानपणापासून या गोष्टी हाताळत आहेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पण नियमाला अपवाद असतोच. झी टीव्हीच्या संगीत कार्यक्रमात एखादा आठ वर्षाचा चिमुरडा इतके अप्रतिम गाऊन जातो की दिग्गज कलाकारसुद्धा तोंडात बोटे घालतात. पण म्हणून सर्वच आठ वर्षांची मुले इतके अप्रतिम गाऊ शकतील असे नाही. कारण ती क्षमताच त्यांच्यात नाही. एवढेच सत्य जरी लक्षात घेतले तरी आज ज्या अनेक समस्यांना पालक म्हणून आपल्याला तोंड द्यावे लागत आहे त्या समस्या बऱ्याच अंशी कमी होतील.

 

©️ डॉ. मेधा फणसळकर.

मो 9423019961.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आरसा ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी

सुश्री दीप्ती कुलकर्णी

☆ विविधा ☆ आरसा ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी☆ 

आरसा ज्याला दर्पण ‘असेही म्हणतात, तो आरसा सर्वांचाच एक आपुलकीचा-जिव्हाळ्याचा विषय आहे. ‘

सांग दर्पणा दिसे मी कशी? असं गुणगुणत दर्पणात पाहणार्या या फक्त युवतीच असतात असं नाही बरं का!

तर अगदी दुडुदुडु चालायला शिकलेली बालके, जगातील अनेक किंवा अगदी सर्व ठिकाणच्या सर्व वयोगटातील लोकांसाठी अर्थातच आबालवृद्धांसाठी आरसा ही एक आवश्यक बाब ठरते.

तयार होऊन शाळेला जाण्यापूर्वी किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्यापूर्वी आपली केशभूषा, पआपली वेशभूषा ठीकठाक आहे कि नाही हे आरसाच सांगतो. कांही शाळात अगदी दर्शनी भागात आरसा टांगलेला असतो कारण विद्यार्थ्यांने गणवेश, केस वर्गात प्रवेश करण्यापूर्वी व्यवस्थित आहेत कि नाहीत हे पाहिल्यानंतरच पुढे व्हावे,नसेल तर व्यवस्थित हो असे आरसा सांगतो. सण-समारंभ,लग्नकार्य अशावेळी तरी  या आरशाची खूपच मदत होते.

पण मित्र हो,आपले बाह्यांग,आपले बाह्यव्यक्तिमत्व जसे आरशात पाहून कळते तसा आणखीहीएक आरसा आपल्या जवळ सतत असतो . तो आरसा म्हणजे मनाचा आरसा. ज्या मनाचा तळ लागत नाही असे म्हणतात त्या मनातील भाव-भावनांचे प्रगटीकरण चेहरारुपी आरशाद्वारे प्रगट होते. मनातील आनंदी,दुःखी, प्रसन्न, काळजीपूर्ण, रागीट, भयभीत असे सर्व भाव चेहरारुपी आरसा स्पष्ट करतो. म्हणूनच म्हंटले जाते.

चित्तं प्रसन्नं भुवनं प्रसन्नं

चित्तं विषण्णं भुवनं विषण्णं।

आपलं आपल्या मनावर नियंत्रण असणं गरजेचं असतं कारण त्यामुळेच आपण व्यक्तिगत भावना लपवून बाहेर ील व्यवहार सुरळीतपणे पार पाडू शकतो. पण याउलट काही वेळा मनाचा आरसा जर चेहर्यावर प्रगट झाला तर त्याचा फायदाही होतो. म्हणजे चेहर्यावर दुःख दिसल्यानंतर जवळच्या व्यक्तीने आपली विचारपूस केली तर दुःख निम्मे  हलके होते.

ब्युटीपार्लर, केशकर्तनालय या ठिकाणी तरी आरसा पाहिजेच. याखेरीज सपाट आरसे आणि गोलीय आरसे प्रकाशाच्या अभ्यासात ,प्रतिमा मिळविण्यासाठी महत्वपूर्ण ठरतात. गोलीय आरशांचा उपयोग काही ठिकाणी प्रदर्शनात अशा प्रकारे केला जातो कि आपली छबी कधी जाड व बुटकी दाखविली जाते तर कधी उभट व लांब दिसते. त्यामुळे आपली करमणुक होते.

म्हणूनच आरसा हा आपला एक जवळचा मित्र आहे असे म्हंटले तर ते वावगे ठरणार नाही.  उभा,आडवा,चौकोनी, गोल,षटकोनी असे सर्व प्रकारचे आरसे आपण पाहतो. पर्समध्ये किंवा अगदी पावडरच्या डबीत मावणार्या छोट्या आरशापासून मोठ्यात मोठे,प्रचंड आरसे असतात. मोठे आरसे आपण राजवाड्यात, आरसेमहालात किंवा वस्तुसंग्रहालयात आपण पाहू शकतो.

गावाकडील आमच्या जुन्या घरात मी भिंतीत बसविलेले आरसे पाहिले। आहेत. चित्रपट स्रुष्टीतही आरशांचा उपयोग अगदी लाजवाब पणे केलेला दिसतो. चला तर, आपणही आरसा बाळगुया नि व्यवस्थित, नीटनेटके राहू या.

© सुश्री दीप्ती कुलकर्णी

कोल्हापूर

भ्र. 9552448461

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आळी मिळी गुप चिळी ☆ सौ. राधिका भांडारकर

☆  विविधा ☆ आळी मिळी गुप चिळी ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

लहानपणी छोटेमोठे कित्येक गुन्हे केले आणि ते लपवण्यासाठी आळी मिळी गुप चिळी हे शस्त्र बिनबोभाट वापरले.घड्याळ फुटलं,बरणीतला खाऊ संपवला,कधी शाळा सुटल्यावर परस्पर मैत्रीणीकडे खेळायला गेलो,कधी वहीत लाल रंगातला शेरा मिळाला, कधी वर्गाच्या बाहेर ऊभं राहण्याची शिक्षाही भोगावी लागली…पण सगळे अपराध कबुल करायलाच हवेत कां?  काही अवश्यकता नाही .”आळी मिळी गुपचिळी..” हेच मस्त. मला वाटते ,अभिनयकला ही जन्मजात देणगी प्रत्येकालाच मिळालेली असते. म्हणूनच “मला काय माहीत?” “मी काय केले.?.”असे निरागस भाव चेहर्‍यावर वागवून आळी मिळी गुप चिळी यशस्वी करता येते… पण एक प्रसंग मात्र खूप कठीण होता.

माझे आजोबा म्हणजे अतिशय शिस्तीचे.नीटनेटके.  स्वच्छता ,टापटीप वाखाणण्यासारखी असली तरी अत्यंत त्रासदायक. वस्तुंच्या जागा ठरलेल्या. एक पेन्सील जरी इकडची तिकडे झाली तरी त्यांच्या चाणाक्ष नजरेतून सुटायचे नाही. मग त्यांच्या कोर्टात आरोपी म्हणून आम्हाला ऊभं रहावं लागायचं… किरकोळ शिवणकामासाठी लागणारी आजोबांची एक सुई होती.सांगितलं तर खोटं वाटेल, अतिशयोक्ती वाटेल! ती एकच सुई ते ३३वर्ष वापरत होते..वापरुन झाल्यावर लहानशा दोर्‍यासकट ते सुताच्या गुंड्यात टोचून ठेवत. त्याचीही विशीष्ट पद्धत होती आणि विशीष्ट जागाही…

एक दिवस मला काय बुद्धी झाली कोण जाणे! आजोबा घरात नसताना मी रूमाल शिवण्यासाठी ती सुई घेतली.

माझा मावसभाऊ रंजन होताच तिथे. त्याने मला फटकारलेही. भांडणच ऊकरुन काढलं आणि त्याच्याशी वाद घालता घालता ती सुई तुटुनच गेली…बाप रे!!

आता काय होणार? खालच्या मजल्यावर माझी मैत्रीण रहायची .तिच्याकडे धावत गेले.तिला सर्व सांगितले.

ती म्हणाली ,”हात्तीच्या! इतकी काय घाबरतेस..ही घे सुई.

आणि ठेवून दे तिथे..सुयांसारख्या सुया…काही कळणार नाही आजोबांना..आळी मिळी गुप चिळी…

रंजनने जमेल तशी ती गुंड्यात खोचून जागच्या जागी ठेवलीही..तेव्हढे बंधुप्रेम दाखवले त्याने….

ही आळी मिळी गुप चिळी मात्र आजोबांच्या मृत्युपर्यंत टिकून राहिली.मैत्रीणीच्या सुईने ३३वर्षांची परंपरा सांभाळली…

पण आज आठवण झाली तरी वाईट वाटतं. अपराधीही वाटतं. महत्व वस्तुचं नसतं.शिकवणीचं असतं.

संस्काराचं असतं. सांभाळणं, जपणं, बारीकसारीक गोष्टींबाबतही निष्काळजी नसणं,जबाबदारी जाणणं, हा मौल्यवान संस्कार आजोबांच्या वागणुकीतून ,अगदी सहज रुजला होता….

धन्यवाद!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

१६/१०/२०२०

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आमची मुलं ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 ☆ विविधा ☆ आमची मुलं ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

मिरजेच्या पासून जवळ असलेल्या आरग या रेल्वे स्टेशन वर माझं लहानपण गेल. आसपास काहीच नव्हतं. पण मागच्या बाजूचा गाई-म्हशींचा गोठा त्यांची लहान पिल्ल कुत्री मांजर अशा प्राणिसंग्रहालयाच्या सहवासातच लहानपण गेल. शिक्षणानिमित्त मिरजेला आलो. प्राणिमात्रांची आवड फक्त मांजरावरच भागवावी लागली. मी अभ्यास करताना आमची सोनाली मांजरी माझा अभ्यास होईपर्यंत मांडीवर जागत बसायची. माझ्या यशाचा वाटा माझ्या या मुलीला दिल्याशिवाय रहात नसे.

लग्नानंतर आमची गावाबाहेर पोल्ट्री आणि त्याला लागून घर होत. टॉमी आणि बंड्या दोन कुत्र्यांच्या आधारावरच आम्ही रहात होतो म्हणा ना! ओसाड परिसर साप विंचू गोम मुंगूस बेडूक आणि चोर अस चित्र होत. एकदा रात्री अकरा वाजेपर्यंत कोणीच घरी आले नाही. लाईट गेले काय कराव सुचेना. अखेर माझ्या बाळाला घेऊन मी बाहेर टॉमी आणि बंड्या यांच्याजवळ येऊन बसले. 100% खात्रीचे अंगरक्षक. बाळाला नवख्या कोणी घेतले आणि तो रडायला लागला की दोघे बेचैन व्हायचे. “बाळ रडतोय लक्ष आहे की नाही” अस नजरेतून मला सांगायचे. सकाळच्या कोवळ्या उन्हात बाळाला मीत्यांच्याजव,ळ ठेवायची. काम होईपर्यंत जबाबदारपणे दोघे त्याला सांभाळायचे. टॉमी, मी साडी बदललेली दिसली की, “मी पण येणार” असं म्हणून मागं मागं यायचा. दोघांच्या भुंकण्यातून साप आहे की चोर आहे की त्याला काही हवंय, हे बरोबर समजायचं. आठ नऊ वर्ष या मुलांनीच आम्हाला सांभाळलं म्हणायला हवं. टॉमीला कॅन्सर झाला. ऑपरेशन झाले. निमूटपणे तोंड वर करुन औषध घ्यायचा. दिवाळीचा सण साजरा झाला. दिवाळीचा लाडू थोडासा खाल्लान आणि दुसरे दिवशी स्वर्गवासी झाला. बंड्या ही किरकोळ दुखण्याने गेला. दोन मुलांची उणिव सतत भासू लागली. लवकरच आपण होऊन छानशी गोंडस कुत्री पिंकी आपण होऊन आली. आणि आमचीच झाली. पहिल्या वेळेला दहा पिल्ले झाली. तिला कोणीतरी पळवून नेल.तीन आठवड्यानी पोट खपाटीला गेलेलं, अंगावर गोमाशा भरलेल्या अशा अवस्थेत परत आली. सगळ्यांनाच खूप आनंद झाला. प्रथम पिलानी आईला ओळख ले नाही. नंतर मात्र आनंदाने नाचायला लागली. कोरडीच आचळ ओढायला लागली. नाईलाजाने एक पिल्लू ठेवून घेतलं. टोनी. दिसायला पिवळाबारीक, गोरा रंग ,उंच, कायम ताठ बसणारा असा टोनी नौ वर्षे  साथ दिलीन त्यानं. त्याला फिरायला मीच न्यावं असा त्याचा हट्ट असायचा. “तूच चल” अस म्हणून माझ्या मागे लागायचा. मुलांबरोबर चेंडू खेळायचा. एकदा मुलांच्या मागे लागून शाळेत ही गेला. शेवटी त्याला घेऊन मुलं परत आली. किती अनुभव सांगावे तितके कमीच. चिमा मांजरी पिलांना शिकार शिकवण्यासाठी काहीना काही घेऊन यायची. एक दा तर जिवंत साप घेऊन आली. पिलांसाठी उंदीर पाली किडे सगळ्यांचा फडशा पाडायची. मागे बांधलेली जयू नावाची गाय ही एक मुलगी. तीच शिंगाचा ऑपरेशन झालं होतं. डॉक्टरांनी सांगितले की तिच्या जखमेवर रोज औषध घालायला हव ती माझ्याशिवाय कोणालाच घालून देत नव्हती. आपल्या सूक्ष्मातल्या भावभावना ही तिला कळत असाव्यात याची खात्री झाली. या सगळ्या मनाच्या नात्याच्या मुला-मुलींनी अनेक  संकटांपासून चोर, विंचू, साप, यापासून वाचवलंयआम्हाला. आता आमच्याकडे चिंगी आणि गोल्डी ही श्वान जोडी काळूराम सुंदरी आणि टिल्ली हे मार्जार त्रिकूट मस्त मजेत राहून आम्हालाही खूप आनंद देतात. या मुलांशी मी गप्पा मारत असते. म्हणजे आपण त्यांच्याशी बोलायचं ,प्रश्न विचारायचे, आणि उत्तरही आपणच द्यायचं. बाहेरून घरी आलो की पहिलं स्वागत तेच करतात  किती आनंद वाटतो ना! ही सगळी आमची मुलं आणि आम्ही त्यांचे आई वडील अस नातं आहे म्हणाना. रस्त्यात जखमी झालेल्या प्राण्यांनाही “राहत “,पीपल फॉर अनिमलच्या” मदतीने उपचार करतो. निपचित पडलेल्या बैलाच्या पोटाचे ऑपरेशन झाले. आणि चार बादल्या प्लास्टिक पिशव्या काढल्या. पिशव्यातून खरकटे टाकणाऱ्यांना काय सांगावे?बऱ्या झालेल्या प्राण्यांच्या डोळ्यातले भाव पहाताना जे समाधान मिळते ते शब्दात सांगता येत नाही. स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं “जीव सेवा हीच ईश्वरसेवा” हे तत्व मनोमन पटत.

कर्मयोग, ज्ञानयोग, आणि भक्ती मार्गाद्वारे आमची मुलं-मुली, (प्राणिमात्र )यांच्यामधील परमेश्वराच्या रूपात पोहोचण्याचा प्रयत्न करत असते. त्यांच्या सहजीवनाच्या धाग्यांच्या गुंफणीतूनच माझ्या जीवनाच सुंदर वस्त्र विणलं गेलंय. किती सुंदर  म ऊ मुलायम उबदार आणि रंग बिरंगी.

© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

पत्ता- ‘पुष्पानंद’ बुधगावकर मळा रस्ता मिरज, जि. सांगली

फो नं. ०२३३-२२१२१५१ मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मंथन ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

 

 ☆ विविधा ☆ बदलता दृष्टीकोन ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

ऐका सख्यांनो, ‘तिची’ कहाणी. ‘ती’ तुमचीच एक सखी. तिची कहाणी पण संसार, मुलं-बाळं, जिवलग, निसर्ग, कुटुंबाचे हीत, परमार्थ, व्रत,त्याग,साफल्य या भोवतीच फिरणारी.

तिचे माहेर छोट्याशा गावातले.  घरी धार्मिक,अध्यात्मिक, पारंपारिक, आधुनिक अशा सर्व विचारांचा मेळ. सर्व देवधर्म, पूजाअर्चा, परंपरा श्रद्धेने जपणारे आई-वडील. इतरांच्या मदतीला धावणारे, सर्वांच्या उपयोगी पडणारे, गावाचा आधारस्तंभ होते. धार्मिक व्रतवैकल्यांबरोबर सामाजिक व्रताचा वसा तिला त्यांच्याकडूनच मिळाला. वारीची परंपरा, त्यातले मर्म समजले.

लग्नानंतर ती मोठ्या शहरात, मोठ्या गोतावळ्यात गेली. तिथले वातावरणही पूर्ण श्रद्धाळू, धार्मिक. तिच्या सासूबाई त्या काळाप्रमाणे कमी शिकलेल्या, सण-वार,परंपरांच्या धबडग्यातल्याच.पण तरीही अतिशय प्रगल्भ विचारसरणी असलेल्या. असंख्य पुस्तकांच्या वाचनाने विचारात, आचारात काळानुरूप बदल केलेल्या. जुन्या कालबाह्य गोष्टी त्यांनीच सोडून दिलेल्या होत्या. त्यामुळे सुनांना त्यांनी कसलीच बंधने कधी घातली नाहीत. ती घरात सर्वात लहान. त्यामुळे सासूबाई नंतर कुळधर्म मोठ्या घरी सुरू झाले. सर्वांनी आपापल्या घरी करण्याऐवजी एका घरी करताना सर्वांनी एकमेकांकडे जाणे, या निमित्ताने नाती जपणे हे तिने कटाक्षाने पाळले. घरामध्ये, नातलगांमध्ये मिळून-मिसळून, सर्वांना धरून राहण्याचे व्रत ती अखंडपणे जपते आहे. या व्रतवैकल्यांचा अंतिम उद्देशच सर्वांचे हित,कल्याण हा आहे. ‘एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ हे खरे आहे.

तिने पुढच्या पिढीला श्रद्धा जपायला शिकवले आहे. प्रथेचे अवडंबर न करता काळानुसार जे शक्य आहे ते मनोभावे करा. माणसातला, स्वत:च्या मनातला देव जपा. त्याच्याशी प्रामाणिक राहा. तो सदैव पाठराखण करतो हेच मनी बिंबवले आहे.

सण उत्सव, व्रतवैकल्ये हवीत. नियम, बंधने, संयम अवश्य हवा. पण या सर्वांसाठी निसर्गाला हानी पोहोचवू नये असे तिचे ठाम मत आहे. फुलं- पानं, फांद्या हव्यात म्हणून झाडांना ओरबाडायचे, निर्माल्य नदीत सोडायच्या निमित्ताने सगळा कचरा, घातक रंगांच्या प्लॅस्टरच्या मूर्ती पाण्यात सोडून जलप्रदूषण करायचे, उत्सवाच्या नावाखाली ध्वनिप्रदूषण करायचे ही कसली आलीय श्रद्धा ? यामुळे उत्सवांच्या मूळ उद्देशालाच दूर सारले जाते ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायला हवी. उत्सवाच्या निमित्ताने आत्मपरीक्षण करायला हवे असे तिला वाटते.

या सणावारांना ऋतू बदलानुसार योग्य खाद्य पदार्थ प्रसाद म्हणून केले जातात. ही गोष्ट आहारशास्त्राशी निगडित आहे. ती निश्चितपणे पाळावी. चातुर्मासाच्या निमित्ताने अनेक नेम धरले जातात. जे आरोग्यास योग्य ते अवश्य करावे. पण या जोडीला आणखी काही नवीन नेम धरता येतील. जास्ती समाजाभिमुख होऊन काही वेगळे संकल्प करावेत असे तिला वाटते.

असे उपक्रम म्हणजे — हॉस्पिटलमधील अॅडमिट पेशंटना भेटणे.एखादे फूल, फळ देऊन ‘लवकर बरे व्हा’ सांगत मानसिक उभारी देणे.

अनाथाश्रम, वृद्धाश्रमातील लोकांना भेटणे.त्यांना चांगली गाणी, गोष्टी ऐकवून मनमोकळ्या गप्पा मारणे.

शाळा-शाळांतील मुलांना चांगली गाणी, गोष्टी, कथा ऐकवणे. त्यांचे वेगवेगळे खेळ घेणे.

घराबाहेर पडू न शकणार्‍या ज्येष्ठांना आवर्जून जाऊन भेटणे.

दर आठवड्याला एका नातेवाईकाला जाऊन निवांतपणे भेटणे.जवळीक वाढवणे.

सर्वांनी मिळून देऊळ, बागा अशा सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करणे.

झाडे लावून ती काळजीपूर्वक वाढवणे. यासारख्या कितीतरी उपयोगी गोष्टी करता येतील.

“मनी वसो रामनाम, हात करो पुण्यकर्म” हेच तर ब्रीद असावे.  पुढच्या पिढीला पण अशा विचारांची दीक्षा देऊन त्यांना या कामात सहभागी करून घ्यायला हवे. ज्याला ज्या मार्गाने जमते त्या मार्गाने त्याने समाजसेवा करावी.

तिने समाजसेवेचा वसा आई-वडिलांकडून घेतला आहे. तो ती वेगवेगळ्या मार्गाने अमलात आणते. आपण ‘समाजाचे देणे’ लागतो ते फेडायचा ती यथाशक्ती प्रयत्न करते. शेवटी समाज म्हणजे कोण?  तुम्ही आम्हीच ना! म्हणून या चांगल्या कामांची स्वतःपासून सुरुवात करायला हवी असे तिचे मत आहे.

तिला ‘खुलभर दुधाची’ कहाणी फार आवडते. प्रत्येकाने आपल्या श्रद्धा जपत उत्सवाच्या निमित्ताने थोडा थोडा हातभार लावला तर समाज प्रबोधन, समाजरक्षण, पर्यावरण रक्षण यांचा हा गोवर्धन निश्चितपणे उचलला जाईल.

तेव्हा मैत्रिणींनो आनंदात समाधानात सण साजरे करूयात.धन्यवाद.

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आविष्कार एका सृजनाचा ☆ सुश्री स्नेहा विनायक दामले

 ☆ विविधा ☆ आविष्कार एका सृजनाचा ☆ सुश्री स्नेहा विनायक दामले ☆ 

आविष्कार एका सृजनाचा

छान किती दिसते फुलपाखरू

मी धरु जाता येई न आता…. फुलपाखराचं असं यथार्थ वर्णन एका कवितेत केलेलं आहे. रंगीत फुलपाखरांची दुनिया मोठी अजब असते. काही दिवसांचे छोटेसे आयुष्य असणारी फुलपाखरं जन्म घेतात ती एकदम मोठी होऊनच! इतर प्राण्यांसारखा ‘बालपण’ हा टप्पाच नसतो त्यांच्या आयुष्यात; आणि या कीटकवर्गी जीवाचा जन्म सुद्धा अगदी वैशिष्ट्यपूर्ण रीतीने होतो. अंडी-अंड्यातून अळी-अळीचा कोष आणि कोषातून फुलपाखरू असा तो प्रवास! मागे एकदा एका फुलपाखरू उद्यानात फुलपाखराच्या या जीवनावस्था जवळून प्रत्यक्ष पाहता आल्या होत्या. झाडांची कुरतडलेली, अर्धवट खाल्लेली पानं ही बरेचदा फुलपाखराच्या अळीचा प्रताप असतो हेही तेव्हा कळलं होतं. तेव्हापासून अशी पानं पाहिली की ही कोणत्या बरं फुलपाखराच्या अळीने खाल्ली असतील या विचाराने कुतूहल जागृत होऊ लागले..  भविष्यात एका सुंदर फुलपाखराला जन्म देण्यासाठी झाडाची पानं विद्रूप करणाऱ्या अळीला पानावरून झटकून टाकण्याची भावना नाहीशी झाली.. असो..

गवतावर बागडणारी पिवळी फुलपाखरे प्रत्येकाने पाहिली असतील. ‘ग्रास यलो’ फुलपाखरे म्हणतात त्यांना. यातही बरेच प्रकार आहेत. याच प्रकारच्या एका फुलपाखराच्या जन्माची ही गोड कहाणी….

माझ्या घरातल्या कुंडीतील शिरीषाच्या रोपावर एक दिवस तीन चार हिरव्यागार उदबत्तीच्या पातळ काडी सारख्या जेमतेम एक सेंटीमीटर लांबीच्या अळ्या दिसल्या. जेमतेम अर्धा फूट उंचीचे ते रोप आणि त्याला चार-पाच चिंचेच्या पानासारखी संयुक्त पानं, छोटी छोट पर्णदलं असणारी.. या एवढ्याच विश्वात या अळ्या दोन-चार दिवस मनसोक्त हुंदडत होत्या; बाजूच्या इतर झाडांकडे ढुंकूनही पाहत नव्हत्या. त्या इटुकल्या झाडाच्या पानांचा फडशा पाडत होत्या आणि दिवसागणिक लठ्ठ होत होत्या. ‘खादाड’ हाच शब्द अगदी बरोबर लागू पडतो त्यांना. मी वाट बघत होते आता पुढे काय होणार? ही अळी कोष कुठे बनवणार? रोज सकाळी उठल्यावर आधी झाडाचे निरीक्षण करत होते. एके दिवशी पाहिलं तर एकही अळी दिसेना! म्हटलं कोष बनवायला दुसरीकडे गेल्या की काय? म्हणून आजूबाजूची झाडं न्याहाळू लागले पण काsही दिसेना.. मग पुन्हा शिरीषाच्या रोपाचंच पान अन् पान बारकाईने पाहू लागले; आणि काय? अगदी पानासारखे दिसणारे, पानाच्या आकाराचे दोन हिरवे कोश मला दिसले आणि एका हिरव्या देठाला बिलगून असलेली एक लठ्ठ अळी, हालचाल न करता अगदी निपचीत पडून असलेली; पटकन दिसणारच नाही अशी! तिच्याकडे पहात मी तशीच उभी राहिले अन् तेवढ्यात अळीची जोरदार हालचाल सुरू झाली!! अळीच्या  शरीराचे एक टोक देठाला चिकटून राहिले आणि दुसरे टोक  अधांतरी लोंबकळत; त्यातून भराभर स्त्राव पाझरू लागला आणि त्यात अळी गुरफटली जाऊ लागली. वीस-पंचवीस सेकंदांचा खेळ!! अळी ‘अळी’ राहिलीच नाही, त्या ठिकाणी हिरव्या रंगाचा त्रिकोणी आकार दिसू लागला. त्रिकोणाचे अधांतरी टोक तेवढ्यात वर देठाकडे सरसावले आणि पुन्हा खाली आले. पाहते तर काय? एका बारीक धाग्याने आता ते टोकही देठाला जोडले गेले होते! विस्फारलेल्या नजरेने मी हा सगळा प्रकार पाहत होते. अगदी अद्भुत!!! हुबेहूब पानासारखा दिसणारा तिसरा कोष आता त्या इवल्याशा रोपावर लटकत होता; खादाड अळी कोषात बंदिस्त झाली होती….

आता रोज मी त्या कोषाचे निरीक्षण करू लागले. चार दिवस उलटले. प्रत्येक दिवसागणिक कोषाचा रंग पालटताना दिसत होता. हिरवा कोष सुरुवातीला पिवळसर होत गडद पिवळा झाला. आणखी एक-दोन दिवसांनी त्या पिवळ्या कोषात काळी कडा उमटलेली दिसली. मी निरखून पाहत होते काही हालचाल दिसते का ते आणि माझे अहोभाग्य की निसर्गाच्या सृजनाचा एक मनमोहक आविष्कार माझ्या डोळ्यासमोर साजरा झाला. एका क्षणात या कोषाच्या, धाग्याने जोडलेल्या टोकातून पिवळी पिवळी लड खाली घरंगळली. रेशमी कापडासारख्या त्या पिवळ्या गुंडाळीतून ताबडतोब दोन काळ्या अँटिना(स्पृशा) उंचावल्या आणि आणि दोन इवल्या पायांची पकड कोषावर घट्ट बसली. पिवळा अपारदर्शी कोष आता रिकामा होऊन पारदर्शक झाला. पिवळी गुंडाळी आता हळूहळू मोकळी होऊ लागली आणि काही सेकंदात काळ्या किनारीचे ठिपकेदार पिवळे पंख पसरले गेले. आपल्या पायांच्या तीन जोड्यांच्या आधाराने कोषाला बिलगलेले, पूर्ण वाढ झालेले ग्रास यलो फुलपाखरू या जगात अवतरले होते.

अर्ध्या-एक मिनिटात घडलेले हे अद्भुत पाहून मी आनंदाने ओरडायचीच बाकी होते. एक बाय अर्धा सेंटीमीटर आकाराच्या कोषातून चांगले तीन सेंटीमीटर लांब पंख असलेले फुलपाखरू बाहेर आले होते. जवळ जवळ तासभर ते तसेच रिकाम्या कोषात पाय रोवून होते; अधून-मधून पंखांची उघडझाप करत होते. एका क्षणी ते झटकन कोष सोडून उडून गेले आणि दूर पसार झाले…

दिवाळीच्या मुहूर्तावर अशाप्रकारे दोन सुंदर जीवांचा आमच्या घरी जन्म झाला होता, दिवाळीचा आनंद त्यांनी दशगुणित केला होता.

 

© सुश्री स्नेहा विनायक दामले

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 3 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे –3 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

माझे कॉलेजला जाणे माझ्यासाठी अनेक प्रकारे आव्हानात्मक होते.  मी एकटी जाऊ शकत नव्हते.  कोणीतरी मैत्रिण बरोबर असेल तरच नियमीत घडे.  समजा कोणी आली नाही, तर वाट पहाण्याशिवाय मी काही

च करू शकत नसे.  मात्र माझी ही अडचण बाबांनी ओळखली आणि उशीर होतोय हे लक्षात आल्यावर ते मला लुनावरून कॉलेज पर्यंत सोडायला यायचे, वर्गापर्यंत सोडायची त्यांची तयारी असायची, पण मी दिसले की कॉलेज मधली कुठलीही मैत्रिण, ओळख असो वा नसो, मला हात द्यायला यायची.  त्यामुळे सगळ्याच माझ्या मैत्रिणी झाल्या होत्या.

शाळे मध्ये माझ्या बाबांचे माझ्यावर protective कवच होते.  सगळेजण सरांची मुलगी म्हणूनच मला ओळखत होते.  मात्र कॉलेज मध्ये आल्यावर घरट्यातून पक्षी कसा भरारी मारतो, तसे मी माझ्या पंखांनी भरारी मारते आहे असेच मला वाटले.  सगळे नवीन , मैत्रिणी नवीन, प्राध्यापक नवीन, वातावरण नवीन.  सुखातीला फार बावचळल्यासारखे झाले, पण नंतर मीच जुळवून घ्यायला सुरवात केली.  प्राध्यापक जे  बोलतात, शिकवतात ते लक्षपूर्वक ऐकायचे, ते सांगतील ते आणि तसेच करायचे हे मी पक्के ठरवले. .

१२वीच्या बोर्डाच्या परीक्षेला थोडे tension आले होते.  रायटर ची मदत घ्यायची हेतर नक्की हेतेच.  माझ्यासाठी एक वर्ग रिकामा ठेवला होता.  मी आणि माझी रायटर एका बाकावर आणि सुपरवायझर मागच्या बाकावर बसल्या होत्या.  त्यांनी त्यांचे काम चोख बजावले.  रायटर कडे पुस्तक, कागद नाही ना, हे त्यांनी तपासले.  त्यावेळी थोडे दडपण आले, पण माझा अभ्यास व्यवस्थित तयार होता.  एक वेगळा अनुभव मिळाला आणि मला १२वी आर्टस ला ६१% मार्क्स मिळाले.

FY B.  A.  चे वर्ष सुरळीत पार पडले.  पण SY मध्ये माझ्या दोन्ही बहिणींची पाठोपाठ लग्ने झाली.  त्यामुळे घरी मला वाचून दाखवणे कमी झाले आणि त्याचा व्हायचा तो परिणाम झाला.  मला A T K T मिळाली, माझा English विषय राहिला.  मला फार वाईट वाटले.  पण बाबानी धीर दिला.. ” अग, एवढे काय त्यात ? ऑक्टोबर ला सोडव”.  त्यांनी माझा अभ्यास घेतला.  पुनः रायटर शोधायला पाहिजे होती.  माझ्या वर्गात अमीना सार वान नावाची मुलगी होती.  ती मला खूप मदत करायची.  तिच्या हाताला पोलीओ झाला होता.  त्यामुळे स ह वेदना ती जाणायची.  मला चांगला राइटर पाहिजे आहे हे समजल्यावर तिने तिच्या लहान बहिणीशी माझी ओळख करून दिली. समीना,बारावी मध्ये होती.ती तयार झाली.रोज संध्याकाळी सहा वाजता,प्रॅक्टिस म्हणूनजुने पेपर्स आम्ही सोडवले.समीना नं खूप छान काम केलं,पेपर मध्ये स्पेलिंग मिस्टेक्स केल्या नाहीत,मी सांगितलं तसं तिनं लिहिलं आणि आश्चर्य म्हणजे मला शंभर पैकी अष्टयाहत्तर मार्क्स मिळाले.

अभ्यासाबरोबरच कॉलेजमध्ये मी वक्तृत्व स्पर्धेत आणि गॅदरिंग मध्येही भाग घेतला. अकरावीमध्ये सायोनारा हा डान्स प्रतिमान माझा बस वला. डान्स ची सगळे ड्रेपरी पांढरी मॅक्सि,ओढणी,पंखा सगळं सगळं सांगली मधुन आणलं होतं.डान्स खूप छान झाला.सगळ्या मुलींनी डोक्यावर घेतलं.माझा डान्स संपल्यावर”यही है राईट  चॉईस बेबी”असा ठेका धरला होता घोषणा देत होत्या. ते मला अजूनही छान आठवते. माझे वक्तृत्व चांगले असल्यामुळे मैत्रिणी माझ्याकडून गाईडन्स घ्यायच्या. मी पण त्यांना मला जे येत असे ते बिनदिक्कत सांगत असे. आमच्यामध्ये निरोगी.  कॉम्पिटिशन होती.

मी कॉलेजमध्ये रमले होते. खूप मैत्रिणी मिळाल्या,सगळ्या प्राध्यापकांची ओळख झाली,अडचण अशी काही आली नाही.सगळ्यांनी मला समजून घेतलं आणि मी सुद्धा माझ्यापरी नं सांभाळून घेतलं.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माझ्या डायरीतले एक पान ☆ सुश्री संगीता कुलकर्णी 

सुश्री संगीता कुलकर्णी

☆ विविधा ☆ माझ्या डायरीतले एक पान ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

सकाळची वेळ…टि.व्ही वर लागलेली जुनी गाणी …बाहेर सुटलेला वारा

वादळाची चाहूल देणारा..पण मन मात्र बैचेन घुसमटलेले..मनात विचारांचे वादळ घोंघावत होते. मनातले विचारांचे हे वादळ काही शमत नव्हते. तेवढ्यात हवेच्या झोक्यानी एक पान माझ्या पायाशी येऊन पडले. ते मी उचलून हातात घेतले. अरे !! हे तर माझ्या डायरीतले एक पान….

मान उंचावून बघितले तर समोरच्या टेबलावरच्या माझ्या डायरीतली पाने वा-याने फडफडीत होती त्यातलेच हे एक पान निसटून माझ्या पायाशी येऊन पडले होते..

कळत-नकळत… त्यातल्या दोन ओळी नजरेत पडल्या…जणू काही देवानेच माझ्या मनातले हे वादळ शमवण्याकरता ते पान माझ्या पायाशी पाडले असावे असे मला मनोमन वाटले…

माझे मन जरा स्थिरावत असतानाच माझ्या मनाने पुन्हा अनपेक्षित असे वळण घेतले व नव्या वाटेची साद घातली….पण हे अनपेक्षित वळण मात्रं माझ्या आयुष्यात” ओंजळीतले सोनेरी क्षण” बनून आले. तेच मी आता तुमच्या समोर उलगडते….

प्रत्येक दिवस हा उगवत असतो तसा तो मावळतही असतो. क्षणोक्षणी आपले वय कमी न होता वाढतच जाते. कितीतरी माणसे जन्माला येतात व मृत्यूही पावतात. पण असे कितीतरी लोक आपल्या मृत्यूला हुलकावणी देऊन परत मागे फिरतात आपले उरलेले आयुष्य व्यतित करण्यासाठी…आयुष्य म्हणजे काय? आपला जन्म कशासाठी झाला आहे? आपण काय करतो?आपले जीवन खरचं काय आहे? असे प्रश्न मनात सतत येत होते पण त्याचे उत्तर काही सापडत नव्हते.याचा सतत विचार करता करता मला त्याचे उत्तर मिळाले..

आयुष्य म्हणजे ” जीवनातील सोनेरी क्षण ” हे ओंजळीत भरून जगण्यासाठी आहे. सुंदर, आनंदी, निरागस जीवन जगण्यासाठी आहेत. आपले जीवन काय आहे? हे ख-या अर्थाने समजून घेण्यासाठी आहेत. जीवन हा एक अनंत सुखाचा झरा आहे. या सुखाला झुल्यावर बसून आपण आनंदाने त्यावर बसून झुलण्यासाठी आहे. तसेच जीवनगीत गाण्यासाठीही आहेत…

प्रत्येकाच्या जीवनात सुख, दुःख, वेदना, नशीबाचा निर्णय, चुकीचा निर्णय, सत्यता अशा अनेक गोष्टी येतच असतात पण त्यातून आपण शहाणं होणं अत्यंत आवश्यक असतं.

स्वतःमध्ये भावतरंगाचे अनेक पैलू असतात ते आपण स्वतः उलगडून पाहिले पाहिजे. त्यांचा अभ्यास केला पाहिजे. तसचं योग्य तो विचार- विनिमय सुद्धा केला पाहिजे.

“जीवन ही एक उदात्त उर्जा आहे व ती ईश्वराने आपल्याला दिलेली एक अमूल्य अशी देणगी आहे.”  असे मला विचाराअंती पटले. ते मी माझ्या मनावर पूर्णपणे बिंबविले व स्वतःमध्ये लगेचच अमुलाग्र बदल घडवायला लागले..

बुद्धिमत्तेच्या जोरावर जगाला दिसेल असं आपलं कर्तृत्व सिद्ध केले पाहिजे. आपण आपल्याला योग्य माणूस म्हणून घडविले पाहिजे. एक चैतन्य मूर्तीही बनलं पाहिजे. दुस-यांना मदत करण्यासाठी सदैव तप्तर ही रहायला पाहिजे. हे सर्व करत असताना आपल्या वैयक्तिक कटकटींना तिलांजली दिली पाहिजे. हे मी सर्व लक्षात ठेवले.

माझ्याशिवाय यांच्यावर प्रेम करणारं दुसरं-तिसरं कुणीही नसून फक्त मीच त्यांची आहे. मला त्यांना भरभरून सुख आनंद समाधान द्यायचा आहे. त्यांच्या चेह-यावर निरागस हास्य फुलवायचे आहे. असा विचार मी माझ्या मनावर पूर्णपणे ठसवला व या कामाला मी लगेचच सुरूवातही केली.. “ओंजळीतले सोनेरी क्षण ” मला सुखद अनुभवता आले. मनाला अतिशय आनंद झाला. या सर्व गोष्टी करत असताना मी माझं मन मात्रं निःस्वार्थी ठेवलं. फळाची अपेक्षा न करता सदैव मदतीचा हात पुढे केला. सगळ्यांशी प्रेमाने वागले -बोलले ..

थोरामोठ्यांचा सन्मान केला. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण काही देणे लागतो आपण ते त्यांना दिले पाहिजे हे लक्षात ठेऊन निःस्वार्थी भावनेने समाजकार्य केले. दुस-यांना आनंद कसा देता येईल याचा सुद्धा विचार केला..

खरचं किती साध्या सोप्या या गोष्टी आहेत. आपल्या जवळ असून सुद्धा आपल्याला त्या कळत नसतात. पण मला त्या कळल्या म्हणून मी देवाचे मनोमन आभार मानले..

खरोखरचं एका अनपेक्षित वळणाने माझं आख्खं आयुष्याचं बदलून टाकलं…चेह-यावर आपोआपच हसू तरळलं…

किती वेळ गेला कुणास ठाऊक ?  मी  तंद्रीतून बाहेर आले व मनातल्या मनात खुदकन् हसत माझ्या कामाला लागले…

 

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

9870451020

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शशीबिंब उतरले धरेवरी ☆ सौ. उज्वला सहस्त्रबुद्धे

☆ विविधा ☆ शशीबिंब उतरले धरेवरी ☆ सौ. उज्वला सहस्त्रबुद्धे

शारदीय नवरात्रानंतर  येणारी ही शरद ऋतूतील पौर्णिमा ही सर्व पौर्णिमांचा जणू हिरेजडित मुकुट आहे! पावसाचे चार महिने संपल्यानंतर शरदाचे सुखद चांदणे आणि पूर्ण चंद्रासह ही पौर्णिमा येते तेव्हा सर्वांच्याच मनात नवचैतन्याचे वारे वाहू लागतात. पौर्णिमेचा चंद्र बघता बघताच मनातले की तसं तर प्रत्येक मराठी महिन्यात येणारी पौर्णिमा ही नवीन काहीतरी घेऊन येते आणि असा विचार मनात येताच माझे मन चैत्री पौर्णिमे कडे वळले.

चैत्र महिन्यात येणारी पौर्णिमा हा हनुमंताचा जन्मदिन आहे. बुद्धीमंत, शक्तिमान असा मारुती चैत्री पौर्णिमेला उगवत्या सूर्या बरोबरच जन्म घेतो आणि आपल्याला शक्तीची उपासना करण्यात प्रवृत्त करतो. चैत्रा नंतर वैशाखात सूर्याचे तापमान वाढू लागते आणि उन्हाचा चटका बसू लागतो. अशावेळी येणारी वैशाखी पौर्णिमा उत्तरेत पंजाब, दिल्ली या सारख्या भागात बैसाखी म्हणून साजरी होते. निसर्गात मिळणारी लिंबू ,कलिंगड, खरबूज यासारखी फळे व त्यांचे रस इथे मुबलक प्रमाणात वापरतात.

त्यानंतर येणारी ज्येष्ठ पौर्णिमा आपल्याला निसर्गाकडे नेते. पावसाची सुरुवात होऊन सृष्टी हिरवीगार होण्याचा हा काळ! या दिवशी स्त्रियांच्या वडपोर्णिमा व्रताचे नाते आपल्याला निसर्गाशी एकरूप होण्यास शिकवते !

आषाढी पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. आई ,गुरुजन, ग्रंथ असो वा निसर्ग आपल्या गुरुस्थानी असणाऱ्या प्रत्येका प्रती आपला कृतज्ञ भाव व्यक्त करणारी ही आषाढातील पौर्णिमा! कधीकधी चंद्राचे दर्शनही होत नाही या पौर्णिमेला! तरीही ही पौर्णिमा आपल्या मनाला एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जाते.

श्रावणात येणार्या नारळी पौर्णिमेपासून पाऊस हळूहळू कमी होऊ लागतो. खवळलेला समुद्र शांत होऊन समुद्रावर कोळी लोकांना आपले व्यवहार करता यावे ,यासाठी समुद्राला नारळ अर्पण करून आपण आपली कृतज्ञता व्यक्त करतो!

भाद्रपदात येणारे गौरी गणपतीचे सण साजरे करून येणारी भाद्रपद पौर्णिमा ही पुढे महालया चे दिवस सुरु करते.आपल्या पूर्वजांचे स्मरण या काळात केले जाते.

या काळात पाऊस कमी होऊन पिके, भाजीपाला याची नवनिर्मिती दिसू लागते.

अश्विन महिन्यातील कोजागिरी पौर्णिमा ही सर्व पौर्णिमांचा मुकुट मणी वाटतो मला! पाऊस संपल्याने सारी सृष्टी हिरवेगार झालेली! दिवाळीसारखा सण तोंडावर आल्याने सगळीकडे उत्साह भरलेला! आकाश निरभ्र होऊन चांदण्यांनी भरलेले तर त्यांचा सखा चंद्र,त्याच्या   शांत, स्निग्ध प्रकाशाने सृष्टीला सौख्य देणारा! या दिवशी चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखवून आपण जागरण करतो. या पौर्णिमेला नवान्न पौर्णिमा असेही म्हणतात. कारण नवीन भात आले असल्याने पौर्णिमेला खिरीचा नैवेद्य केला जातो.

कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरी पौर्णिमा! संध्याकाळच्या शांत वातावरणात त्रिपुर लावून त्याची शोभा पहाण्याचा आनंद वेगळाच! त्रिपुरासुराचा वध केला तो हा दिवस म्हणून त्रिपुरी पौर्णिमेचे महत्व!

आल्हाददायक वातावरणात येणारी मार्गशीर्ष  पौर्णिमा! या पौर्णिमेचा चंद्र आकाराने थोडा मोठाच वाटतो. हळूहळू दिवस मोठा होत जाणार आणि रात्र लहान याची जाणीव करून देणारा! सर्व सृष्टीचे तारणहार ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा दत्तावतार मार्गशीर्ष पौर्णिमेला होतो.

माघी   पौर्णिमेचे  वैशिष्ट्य जाणवते ते माघ स्नानात! या काळात, तीर्थक्षेत्री नद्यांच्या काठी मोठे मोठे मेळे भरतात आणि लोक पवित्र नदी स्नानाचा आनंद घेतात!

अशा तऱ्हेने वर्ष संपत येते आणि फाल्गुन पौर्णिमा येते.  सर्व वाईट गोष्टींचे अग्नि समर्पण करून चांगल्याचा उदय व्हावा म्हणून होळी पेटवली जाते!

यानंतर आपण पुन्हा नवीन वर्षाचे स्वागत करायला सज्ज होतो.

हिंदू संस्कृतीत निसर्गातील पंचमहाभूतांचा संबंध आपण सणांशी जोडला आहे. पृथ्वी ,आप, तेज, वायु ,.आकाश या सर्वांशी निगडीत असे आपले सण वार आहेत. पौर्णिमा हे भरतीचे प्रतीक आहे.कोणताही आनंद हा पौर्णिमेच्या चंद्रासारखा भरभरून घेता आला पाहिजे! भरतीनंतर ओहोटी हा निसर्ग नियमच आहे. जसे पौर्णिमेनंतर पंधरा दिवसांनी येणारी अमावस्या! अमावस्या नंतर दुसऱ्याच दिवसापासून कलेकलेने चंद्रकला वाढताना आपल्याला दिसते. मनावर आलेली अमावस्येची काजळी दूर होत होत होत पौर्णिमे कडे वाटचाल चालू होते. आपलं जीवन हे असंच असतं!सुखदुःखाच्या चंद्रकला नी व्यापलेले! कधी दुःखाचे क्षण येतात पण त्यांची तीव्रता काळाबरोबर कमी कमी होत जाते आणि सुखाची पौर्णिमा दिसू लागते. पण कायमच पौर्णिमा राहिली तर तिचे काय महत्त्व! तसेच पूर्णत्व हेही कायमचे नसते!’ पूर्णत्वाच्या पलीकडे नष्टत्त्वाचे  उभे कडे’ अशी एक उक्ती आहे. त्याप्रमाणे सुखदुःखाची भरती ओहोटी आयुष्यात येत राहते. पुर्ण चंद्राचे या भरती ओहोटीशी कायमचे नाते असते. असा हा पूर्ण चंद्र प्रत्येक पौर्णिमेला आपण बघतो पण निसर्गाच्या अत्युत्तम अविष्काराचा दिवस कोजागिरी ला आपण पहातो.या दिवशी चंद्रप्रकाशात आटीव दुधाचा नैवेद्य दाखवून दुधाचा आस्वाद घ्यावा.आणि चांदणी रात्र आपण आनंदात घालवू या असाच विचार कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने मनात आला!

© सौ. उज्वला सहस्त्रबुद्धे

मो.नं . 8087974168

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print