मराठी साहित्य – विविधा ☆ जीवन जगण्याची कला :- अध्यात्म – भाग – २ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

जीवन जगण्याची कला :- अध्यात्म – भाग – २ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

(आजपर्यंत जी लोकं यशस्वी झाली आहेत त्यांनी कधीही आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणांना प्रतिक्रिया दिलेली नाही तर विवेकाने ‘प्रतिसाद’ दिला आहे.) – इथून पुढे

यशापयश हे सुद्धा सुखदुःखासारखेच सापेक्ष आहे. अमुक मार्क मिळविले, अमुक महाविद्यालयात प्रवेश मिळाला, नामांकित कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाली, परदेशात जाता आले, मोठ घर बांधता आले, महागडे वाहन विकत घेता आले किंवा एखादे स्वप्न सत्यात आणता आले तर आपण यशस्वी झालो आणि यामधील मोजक्याच गोष्टी करता आल्या किंवा यातील काहीच जमलं नाही तर मी अपयशी झालो. ही दोन्हीही वाक्ये अर्धसत्य आहेत. जोपर्यंत आपण हिंमत हरलेलो नाही तोपर्यंत आपण अपयशी असूच शकत नाही. जीवनातील यश हे नेहमी कोणते शिखर पार केले यापेक्षा ते पार करताना किती अडथळे आले यावर ठरत असते आणि ठरायलाही हवे. एखादं वेळेस लौकिक दृष्ट्या मनुष्याला अपयश येऊ शकते. पण या सर्व घडामोडीत, धबडग्यात ‘मनुष्य’ म्हणून आपले मूल्य वाढविणे हे सुद्धा यशस्वी होणेच होय. एका वाक्यात यश म्हणजे काय सांगायचे असेल तर खालील प्रमाणे सांगता येईल. “मरावे परी कीर्ती रूपे उरावे।” तसेच यशाची आणिक एक सोपी व्याख्या आहे. ‘आपल्याला लौकीक जीवनात किती यश मिळालं यापेक्षा आपल्याला दुसऱ्यांना यश मिळविण्यासाठी किती मदत करता आली’.

समाधान नावाची कोणतीही वस्तू बाजारात मिळत नाही. ज्याला स्वतःला नक्की काय हवे आहे हे योग्य वेळी कळते, तो ते मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो, कधीकधी तो गोष्ट मिळतेच असे नाही. पण तरीही आपण पुरेसे कष्ट घेतले, योग्य ते प्रयत्न केले असे समजून ही माणसे नवीन जोमाने परत कार्यरत होताना दिसतात. यश मिळालं नाही तर रडत न बसता केलेल्या प्रयत्नातून अमुक एक गोष्ट शिकता आली याचेही त्यांना समाधान असते. कोणतेही काम उरकण्यापेक्षा त्यांचे कामाच्या परिपुर्णतेकडे जास्त लक्ष असते.

“मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण।”

किंवा

“रण जिंकून नाही जिंकता येत ‘मन’।

‘मन’ जिंकल्याशिवाय नाही जिंकता येत रण।।”

आधुनिक विज्ञान असे सांगते की जी गोष्ट जितकी सूक्ष्म असते ती अधिक शक्तिशाली आणि नियंत्रित करण्यासाठी जिकिरीची असते. अणुबाँब किंवा अणुशक्ती ही याची उत्तम उदाहरणे आहेत. मानवी मन यापेक्षा सूक्ष्म असते. अणू प्रयोगशाळेत तरी दाखवता येईल पण मनाचा थांगपत्ता लागणे अतीमुश्किल !!

म्हणून कोणतेही संत असोत, त्यांनी सर्वप्रथम उपदेश आपल्या मनाला केला असावा. नुसता उपदेश केला नाही तर मनाला प्रसन्न करुन घेण्याचे विविध मार्ग त्यांनी आपल्यासाठी सहज उपलब्ध करुन दिले आहेत. मुळात मन प्रसन्न का करायचे? याचा आधी विचार करायला हवा. मला जीवनाकडून नक्की काय हवे आहे? मनुष्य म्हणून माझा जन्म झाला असेल तर मनुष्य म्हणून माझे काही विहित कर्तव्य असलेच पाहिजे. जगात कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही असे विज्ञान सांगते, तर माझा जन्म झाला याला काहीतरी प्रयोजन नक्कीच असणार. ? मनुष्य म्हणून आपण सर्व सारखे असलो तरी आपण एकाच कारखान्यात उत्पादीत केलेले एकाच वजनाचे, एकाच सुगंधाचे ‘साबण’ नाही. त्यामुळे प्रत्येकाचे जीवनध्येय वेगवेगळे असणे स्वाभाविक आहे. ते जीवनध्येय शोधणे आणि त्यानुसार आचरण करणे हे मनुष्याचे आद्यकर्तव्य असले पाहिजे. पण मनुष्य देहबुद्धीच्या अधीन जाऊन ‘आहार, निद्रा, भय आणि मैथुन’ यालाच आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता मानतो आणि

*”पुनरपि जननं पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनं” याच चक्रात फिरत राहतो.

आतापर्यंत आपण सामान्य मनुष्य कसा वागतो, त्याचे दुष्परिणाम काय होतात, त्यामुळे मनुष्याचे कसे नुकसान होते हे आपण पाहिले. प्रत्येकाला आनंद / समाधान हवे आहे पण ते का मिळत नाही हे सुद्धा आपण पाहिले. आता तो कसा मिळवायचा ते आपण पाहूया.

सर्वप्रथम आपले एकमत आहे ना की आपल्याला आपल्या जीवनात आनंद हवा आहे. सर्वाना मान्य असेल तर आपण पुढे जाऊ. धन्यवाद.

आपला आजचा विषय आहे जीवन जगण्याची कला:- अध्यात्म !! अर्थात कोणतीही कला शिकायची असेल तर ती शिकण्यासाठी काही नियम असणे स्वाभाविक आहे.

१. ही सृष्टी निसर्गनियमानुसार चालते

२. आपण सुद्धा यासृष्टीचे एक अविभाज्य घटक आहोत.

३. ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या न्यायाने वरील सर्व नियम मलाही तंतोतंत लागू होतात.

४. मी आजपासून दृढनिश्चय केला आहे की मला ‘आनंदी जीवन जगण्याची’ कला शिकायची आहे.

५. त्यामुळे ही कला शिकण्यात यशस्वी होणे ही सर्वस्वी माझी जबाबदारी आहे.

६. सामान्य मनुष्याला साधारणपणे जबाबदारी झटकण्याची थोडी सवय असते असे आपल्या लक्षात येईल. प्रत्येक गोष्ट सरकारने करावी असा त्याचा मूक हट्ट असतो. त्याला यो योग्य जागी व्यक्त करता येत नाही, त्यामुळे त्यातून अपेक्षित लाभ त्याला होत नाही आणि झालाच तर तो योग्य वेळी मिळत नाही. थोडक्यात त्याचा अपेक्षाभंगच होतो. एकदा त्याने स्वतः स्वतःची जबाबदारी घेतली तर ‘अचानक उन्हात चांदणे पडावे’ असा त्याच्यामध्ये, त्याच्या दृष्टिकोनात बदल झाल्याचे दृष्टीस पडते. कालपर्यंत नकोसे असलेले तेच जग दृष्टिकोन बदलल्यामुळे त्याला आज अधिक आकर्षक वाटू लागते.

समाजात सध्या काही शब्दांचे खरे अर्थ पुन्हा एकदा समजावून सांगण्याची गरज आहे असे जाणवते. तसेच बऱ्याच शब्दांचे अर्थ समजून घेण्यात किंवा समजून देण्यात आपण गल्लत करीत आहोत असे वाटते. त्यात प्रामुख्याने ‘धर्म’ आणि ‘अध्यात्म’ हे दोन शब्द येतात किंवा आज आपल्या विषयाशी निगडित असे हे दोन शब्द आहेत. आधी आपण धर्म म्हणजे काय ते पाहू. सध्या आपल्याकडे धर्म हा शब्द ‘पंथ’ (religion) या अर्थाने शासनाने स्वीकारला आहे आणि शालेय अभ्यासक्रमातून तेच शिकविले गेल्यामुळे मागील पिढीपासून हाच अर्थ मनामध्ये रुजला आहे. यामुळे धर्म या शब्दाबद्दल अनेक समजुती/गैरसमजुती समाजात रुढ झाल्या आहेत असे जाणवते. जो सर्वांची धारणा करतो, तो धर्म! आपल्याकडे मातृधर्म, पितृधर्म, राजधर्म, पुत्रधर्म असे विविध धर्म सांगितले गेले आहेत. वरील शब्दांतून मनुष्याचे कर्तव्य प्रगट होते. पण सध्या पूजपाठादि कर्म म्हणजे धर्म, उपासतापास म्हणजे धर्म. सणसमारंभ म्हणजे धर्म अशा अनेक चुकीच्या समजुती समाजात रुढ झाल्या आहेत. देवळात जाणे आणि धर्मापर्यंत जाणे यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. देवळात जाणे ही भौतिक, शाररिक घटना आहे. धर्मांजवळ जाणे ही आत्मिक घटना आहे. देवळापर्यंत जाणे ही भौतिक यात्रा आहे, ही अध्यात्मिक यात्रा नव्हे. ज्याची अध्यात्मिक यात्रा सुरु होते त्याला सारी पृथ्वीचं मंदिरासारखी दिसायला लागते. आणि मग मंदिर कुठे आहे, हे शोधणं त्याला कठीण होऊन जातं. मानणं हा धर्म नाही तर जाणणं हा धर्म.

अध्यात्म म्हणजे भगवी वस्त्रे, अध्यात्म म्हणजे गळ्यात माळ, अध्यात्म म्हणजे जपतप, अध्यात्म म्हणजे कर्मकांड, अध्यात्म म्हणजे उपासतापास, अध्यात्म म्हणजे तिर्थ यात्रा, अध्यात्म म्हणजे दानधर्म, अध्यात्म म्हणजे देवदर्शन, अध्यात्म म्हणजे ब्रह्मचर्य, अध्यात्म म्हणजे वारी, अध्यात्म म्हणजे कथा कीर्तन, अध्यात्म म्हणजे भजन पूजन, अध्यात्म म्हणजे गुरू, अध्यात्म म्हणजे अनुग्रह/दीक्षा, अध्यात्म म्हणजे मठ मंदिर, अध्यात्म म्हणजे गूढ, अध्यात्म म्हणजे फक्त बिनकामाच्या लोकांचा उद्योग, अध्यात्म म्हणजे दासबोध, ज्ञानेश्वरी गाथा इ. ग्रंथांचे वाचन, अध्यात्म म्हणजे साठीनंतर वेळ घालवण्याचे साधन असे अध्यात्म शब्दाचे अनेक अर्थ आज समाजात रूढ आहेत. पण अध्यात्म या शब्दाच्या काही समर्पक अर्थ पुढीलप्रमाणे असू शकतील. अध्यात्म म्हणजे निरासक्ती ( detachment), अध्यात्म म्हणजे प्रतिसाद आणि सर्वात चांगला आणि सर्वाना सहज समजेल असे दोनच शब्द ‘आई’!! आनंदी किंवा अध्यात्मिक जीवन जगण्यासाठी एकतर ‘सर्वांची आई’ व्हा अन्यथा ‘सर्वांना आई’ माना.

आई म्हणजे वात्सल्य. बाळाला जन्म देऊन फारतर एखादी स्त्री जन्मदात्री होऊ शकेल आई होण्यासाठी अधिक काही असण्याची, करण्याची निश्चित गरज आहे. आई कधी रागावते का? सगळा दया-क्षमा-शांतीचा कारभार!. ज्यांनी प्रत्येक स्त्री मध्ये मातृत्व बघितले ते संत झाले आणि ज्या मातांनी आपल्या मुलांना प्रत्येक स्त्रीकडे बघताना, समाजाकडे बघताना, देशाकडे बघताना पुत्रभावाने बघायला शिकविले ते महापुरुष झाले. भारतातील सर्व महापुरुष महान मातृभक्त होते. जो मातृभक्त नाही तो महान होऊच शकत नाही. आज ‘मातृत्व’भावाचा अभाव असल्यानेच अनेक समस्या भीषण रूप धारण करीत आहेत. आपण खऱ्या अर्थाने ‘मातृत्व भावना’ पुनः प्रस्थापित करु शकलो तर पन्नास टक्के समस्या आपसूक संपतील.

एक संतवचन आहे, “आपल्या बायकोतील आई दिसायला लागली साधक पक्का झाला.”

हा ‘भाव’ जागृत रहावा म्हणून पूर्वी स्त्रिया स्वतःची ओळख मी अमक्याची आई अशी करुन द्यायच्या. छोट्या छोट्या गोष्टींचा मनुष्याच्या मनावर परिणाम होत असतो हे आज आधुनिक विज्ञान सुद्धा मान्य करते. आपल्या पूर्वसूरींना किती सूक्ष्म विचार केला होतां याचे हे आपल्या यावरुन लक्षात येईल. मेमरी कार्ड वरील एखादा bite खराब झाला तर अख्खे memori card corrupt होते, तसेच मनावरील तृष्णेचा एखादा छोटासा डाग देखील आयुष्याच्या नाशास कारणीभूत होऊ शकतो. शिल्प घडवताना कारागीर पुरेशी सावधनाता बाळगून काम करतो. अगदी त्याचप्रमाणे मानवी जीवनाचे शिल्प घडवताना अखंड सावधानता बाळगणे अत्यावश्यक आहे.

म्हणून समर्थ म्हणतात, “अखंड सावधान असावे।” तर तुकाराम महाराज म्हणतात, “रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग।” तर श्री सद्गुरू गोंदवलेकर महाराज म्हणतात की ‘सतत नामात राहावे. ‘ आजच्या भाषेत सांगायचे झाले तर ‘range’ मध्ये रहा. ‘Be Connected.’

– क्रमशः भाग दुसरा 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘‘लता मंगेशकर : सप्तसुरांच्या गंधर्वगायनाची आकाशगंगा’’– ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

☆ ‘‘लता मंगेशकर : सप्तसुरांच्या गंधर्वगायनाची आकाशगंगा’’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(२८ सप्टेंबर १९२९- ६ फेब्रुवारी २०२२)

नमस्कार प्रिय मैत्रांनो! 

एको अहं, द्वितीयो नास्ति, न भूतो न भविष्यति!’

(म्हणजे फक्त मीच आहे, बाकी सर्व मिथ्या आहे, ना माझ्यासारखे कोणी आले आहे ना माझ्यासारखे कोणी येणार आहे. ना भूतकाळात असे काही घडले आहे, ना भविष्यात असे काही घडणार आहे!) 

वरील अवतरण गान सरस्वती लता मंगेशकरवर सर्वोपरी उचित रूपाने लागू होते. लता मंगेशकरला शास्त्रीय संगीताचा वारसा महान नाट्यअभिनेता गायक तिचे पिता दीनानाथ मंगेशकर यांच्या कडून मिळाला. लहानग्या लताच्या गायनी कळा दीनानाथांनी ओळखल्या आणि तेव्हापासून तिचा जो रियाज सुरु झाला तो अविरत सुरूच राहिला. शास्त्रीय गायन करण्याची संपूर्ण क्षमता असूनही पित्याच्या अकाली निधनानंतर तिचे वडिलांकडून संगीतदीक्षा अधुरी राहिली. सिनेक्षेत्रात पदार्पण केल्यावर देखील प्रतिभावान गुणी संगीतकारांनी तिचे हे शास्त्रीय संगीतातील प्राविण्य ओळखून तिला अशा कांही संगीतरचना बहाल केल्या की पट्टीचे संगीतकार देखील अवाक झाले. बडे गुलाम अली खान आणि बेगम अख्तर सारख्या प्रसिद्ध कलाकारांनी तिला खूप नावाजले आणि तिच्या या स्वरगंधाराची मुक्त कंठाने तारीफ केली.        

मंडळी, लता मंगेशकरवर लिहिणे म्हणजे एखाद्या समुद्रातील रत्ने शोधून त्यांचे मूल्यमापन करणे सोपे, पण लताने गायलेल्या हजारो गाण्यांपैकी कांही निवडक गाण्यांवर लिहिणे त्यापेक्षा दुष्कर कार्य आहे. म्हणूनच या लेखात शास्त्रीय संगीतावर आधारित अशा माझ्या आवडत्या निव्वळ तीन गाण्यांविषयी चर्चा करीन. शास्त्रीय संगीत शिकलेले नसतांना देखील माझ्यासारखी अज्ञ व्यक्ती हे लिहायचे धाडस करीत आहे, कारण लता आमच्या हृदयात सदैव अक्षय संगीतप्रेमाचे प्रतीक अशी लतादीदी म्हणूनच अमर आहे.   

पहिले गाणे आठवले ते ‘ऋतू आये ऋतू जाये सखी री, मन के मीत न आये’ हे ‘हमदर्द’ (१९५३) सिनेमातले गाणे, गायले आहे लता मंगेशकर आणि मन्ना डे यांनी! चार कडवी चार शास्त्रीय रागात बांधली आहेत बुजुर्ग प्रतिभावान संगीतकार अनिल बिस्वास यांनी! हे चार राग आहेत (क्रमश:) राग गौड़ सारंग (ग्रीष्म ऋतू) , राग गौड़ मल्हार (वर्ष ऋतू), जोगिया (शिशिर ऋतू ) आणि बहार (वसंत ऋतू!) एका मुलाखतीत लताने सांगितले की अनिलदा आमचे ‘मास्टरदाच’ होते. वरील गाण्याच्या रिहर्सल मन्ना डे आणि लता जवळपास दोन आठवडे करीत होते. म्हणूनच हे गाणे शास्त्रीय संगीतावर आधारित सिनेगीतांमध्ये सर्वोच्च स्थानावर आहे असे मला वाटते. एक अजून माहिती मिळाली की यातील सारंगी पं.रामनारायण यांनी वाजवली आहे. शेखर आणि निम्मी या कलावंतांवर हे गाणे चित्रित झाले. हमदर्द सिनेमा कांही खूप गाजला होता असेही नाही, पण प्रेम धवन, अनिलदा, लता आणि मन्ना डे यांनी हे गाणे अजरामर करून ठेवले. मन्ना डे यांची शास्त्रीय गाण्यांवर किती मजबूत पकड होती हा स्वतंत्र लेखनाचा विषय आहे. 

अनिलदांनी तिला संगीतातले खूप बारकावे समजावून सांगितले. श्वास सोडतांना माईकवर तो कसा जाणवू द्यायचा नाही, हे अनिलदांनीच शिकवले. म्हणूनच कठीण आणि दीर्घ ताना घेतांना लता मध्ये कुठे श्वास घ्यायची हे कोडेच आहे. इतके मात्र वाचले होते की बऱ्याच गाण्यात लता नेमका कुठं अन कसा श्वास घेते हे शोधण्यात बऱ्याच नवोदित गायिकांचे आयुष्य खर्ची पडले, पण दुर्दैवाने त्यांना उत्तर मिळाले नाही. आमच्यासारखे रसिक या भानगडीत पडत नाहीत, सरळ गानशारदेला नमन करायचं, अन गाणं जी भरके एन्जॉय करायचं. 

दुसरे एकमेकाद्वितीय गाणे, सौतेला भाई (१९६२) मधले, यातला हाच एक सगा करिष्मा! लता किती म्हणून रियाज करत असावी याची साक्ष देणारे, शास्त्रीय गायक जे तासनतास गाऊन साध्य करत असतील किंवा नसतील ते या ३-४ मिनिटात लताने साध्य केलंय. ती शास्त्रीय गायन करत होतीच, माध्यम वेगळे होते इतकेच. ‘जा मैं तोसे नाहीं बोलूं’ (राग सहाना बहार) हेच ते अजरामर गाणे, लताच्या रागदारीवर आधारित गाण्यांपैकी एक बेहतरीन पेशकश! पडद्यावर दोन कथक नृत्यांगना, राणीबाला अन रत्ना या दोन दुधारी तलवारीसारख्या, नृत्य काय तर टिपिकल मुजरा, त्यांच्या जीवघेण्या दिलकश अदा, अदब, तहजीब, नृत्याभिनय, इत्यादी इत्यादी तर आहेतच, त्यांच्या कात्रीत सापडलेला नायक गुरुदत्त, पण या सर्वांना पुरून उरलेला लताचा जलप्रपातासारखा अक्षरशः अंगावर कोसळणारा स्वर! स्वरानंदाच्या तुषारात चिंब भिजवणारा! दोन नृत्यांगनांसाठी लताच्या स्वराविष्काराचा वेगवेगळा लहेजा! वाह क्या बात है! तिच्या ताना ऐकून अवाक व्हायला होते. गाण्यातील जादूभरले शब्द शैलेंद्र यांचे आणि संगीत माझे प्रिय संगीतकार अनिलदा यांचेच!    

तिसरे माझे अत्यंत आवडीचे गाणे म्हणजे ‘जा जा रे जा बालमवा!’ हे हिंदी सिनेमातील सर्वसामान्य पठडीतला मुजरा या शीर्षकांत मोडणारे गाणे. चित्रपट ‘बसंतबहार’ (१९५६), पडद्यावर तेव्हाचा नामी खलनायक चंद्रशेखर आणि त्याला भुलवत मुजरा सादर करणारी कुमकुम! मंडळी, मला वाटते की या कुमकुमच्या सुंदर रूपाचा अन अभिनयाचा म्हणावा तितका उपयोग फिल्म इंडस्ट्रीने केला नाही. नेहमी दुय्यम स्थानावरील सहनायिकाच राहिली ती. पण हे गाणे बघाल तेव्हां ही कसलेली अभिनेत्री होती याची आपल्याला खात्री पटेल. या गाण्यात लताचा फिरत घेणारा स्वर्गतुल्य कोमल स्वरगंधार, शैलेंद्र यांचे प्रसंगानुरूप दिलखेचक शब्द, शंकर जयकिशन यांचे राग झिंझोटीवर आधारित एक नंबरचे लाजवाब संगीत तर आहेच, पण कुमकुमचा नखरा, तिचा बोलका चेहरा, भावविभ्रम आणि जबरदस्त शास्त्रीय नृत्याची जाण या गाण्याला अस्मानात घेऊन गेली. या गाण्यातील लताच्या स्वरांचा तो अद्भुतरम्य हँगओव्हर गाणे संपल्यावरही कमी होत नाही हा माझा नेहमीचा अनुभव!  

मैत्रांनो, अशी सर्वांगसुंदर गाणी यू ट्यूब वर बघायची सोय आहे हे आपले परम भाग्यच! बघा ना चित्रपट चालो अथवा न चालो, ही गाणी रसिकांच्या हृदयात कायमस्वरूपाने विराजमान झालीत. श्वेत- श्याम रंगात असूनही या गाण्यांनी आपल्या आयुष्यात आनंदाचे किती रंग भरले त्यांची गणतीच नाही. म्हणूनच आजच्या निमित्याने या गाण्यांची चर्चा करावीशी वाटली!    

२८ सप्टेंबरच्या लताच्या जन्मदिनाचे निमित्य साधत या स्वरशारदेच्या दिव्यचरणी ही भावशब्दसुमने अर्पण करते!💐 

 ( टीप- वरील तीन गाण्यांची लिंक जोडत आहे. लिंक न उघडल्यास गाण्याचे शब्द यू ट्यूब वर टाकावेत. 

https://youtu.be/L8ht_BXmOp4?si=bjAj8WctCbWfV3vA

‘ऋतू आये ऋतू जाये सखी री, मन के मीत न आये’- चित्रपट: ‘हमदर्द’ (१९५३) 

गायक-गायिका: मन्ना डे, लता मंगेशकर, गीतकार: प्रेम धवन, संगीतकार: अनिल बिस्वास 

https://youtu.be/WTcXSp2KvNs?si=hOJDPY4Vi3q7ggSc

‘जा मैं तोसे नाहीं बोलूं’- चित्रपट: सौतेला भाई (१९६२)

गायिका: लता मंगेशकर, गीतकार: शैलेंद्र, संगीतकार: अनिल बिस्वास

 

https://youtu.be/TwBNRmvwAxA?si=k9GJJYMtvw-rjUrs

‘जा जा रे जा बालमवा!’-  चित्रपट: बसंत बहार 

गायिका: लता मंगेशकर, गीतकार: शैलेंद्र, संगीतकार: शंकर जयकिशन ) 

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जीवन जगण्याची कला :- अध्यात्म – भाग – १ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

जीवन जगण्याची कला :- अध्यात्म – भाग – १ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

भारतीय संस्कृती ही खूप पुरातन आहे. बऱ्याच परदेशी प्रवाशांनी वर्णन केल्याप्रमाणे आपला देश सर्वच क्षेत्रात नुसता प्रगतीपथावर नव्हता तर प्रगतीच्या शिखरावर होता असे म्हटले तर वावगे होणार नाही. इथे सोन्याचा धूर निघायचा असे वर्णन केलेले आढळते. लोकं काठीला सोने बांधून काशियात्रेला जात असत. सर्वच क्षेत्रांत भारत सर्वोच्च स्थानावर होता. जगाच्या पाठीवर अनेक संस्कृतींचा उदयास्त झाला. यासर्व कालप्रवाहात एकमेव संस्कृती टिकून राहिली ती म्हणजे भारतीय संस्कृती !!! चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा उगम आणि विकास इथेच झाला. या सर्व कला म्हणजे भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. त्याकाळात भारताने नुसती भौतिक प्रगती केलेली नव्हती तर आध्यत्मिक क्षेत्रात सुद्धा परमोच्च स्थिती प्राप्त केली होती. मानवी जीवनाचा विकास फक्त मनुष्याच्या भौतिक गरजा भागवून होत नाही हे आपल्या ऋषीमुनींनी जाणले होते. त्यामुळे त्यांनी मनुष्याच्या भौतिक गरजांसोबत त्याच्या मनाचाही सखोल अभ्यास केला. आपल्याकडील सर्व ऋषीमुनी उत्तम मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी आपल्या संस्कृतीची जडणघडण पूर्णपणे निसर्गानुकूल (ecofriendly) आणि मानवी मनाच्या विविध कंगोऱ्यांचा अभ्यास करुन केली. भौतिकसुबत्ता किंवा अमर्याद भौतिकसुख हे काही मानवी जीवनाचे अंतिम साध्य असू शकत नाही हे त्यांनी त्या पद्धतीने जगून समजून घेतले. नुसत्या अमर्याद भौतिक गरजा पूर्ण करण्याच्या स्पर्धेमुळें अमेरिकेची अवस्था काय झाली आहे आपल्याला ज्ञात आहे. जोपर्यंत मनुष्याचे मन शांत होत नाही तोपर्यंत तो कधीच खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकत नाही, हे आपल्या पूर्वजांनी जाणले. आणि जसा रोग तसे औषध या उक्तीनुसार त्यावर उपाय शोधला. उपाय शोधणे कोणीही करु शकेल पण मानवी जीवनाचा अभ्यास करुन त्याप्रमाणे आदर्श जीवनचर्या आखणे आणि तो समाजातील सामान्य मनुष्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग होणे हे लिहायला, ऐकायला सामान्य वाटले तरी हे जनमानसात रुजविणे फार अवघड होते. पण आपल्या पूर्वजांनी तेही करून दाखविले. तसेच संवर्धितही केले. थोडक्यात दैनंदिन जीवन जगताना मनःशांती मिळवायची असते हे त्यांनी विसरायला लावले आणि अशी जीवनपद्धती विकसित केली की त्या पद्धतीने मनुष्याची आपसूक मनशक्ती वाढून मन:शांतीचा नकळत लाभ होईल. याविशिष्ट जीवनपद्धतीला त्यांनी ‘अध्यात्म’ असे नाव दिले.

अध्यात्म ही खरं तर भारतीय जीवनपद्धती (आचारपद्धती) आहे, जीवनकला आहे. हजारो वर्षांची राजकीय गुलामगिरी जरी संपली असली तर सांस्कृतिक गुलामगिरीचा पघडा जनमानसावर अजून आहे असे ठळकपणे जाणवते. सध्याची आपली जीवनपद्धती ना धड भारतीय आहे ना पूर्णपणे विदेशी. सरमिसळ झालेल्या संस्कृतीत आपण सर्व अजब पद्धतीने आपले जीवन जगत आहोत. आपले सोडायला मन धजावत नाही आणि पाश्चात्यांचे पूर्ण स्वीकारता येत नाही. अशी द्विधा मनःस्थिती आपली सर्वांची कमीअधिक प्रमाणात आहे. प्रत्येकाला जीवनात आनंद हवा आहे, पण आज माझ्या जवळ आनंद आहे किंवा मी आनंदी आहे असे स्वतःहून, मनःपूर्वक छातीठोकपणे म्हणणारा मनुष्य शोधावा लागेल अशी परिस्थिती आहे. यावर एकच उपाय आहे तो म्हणजे आपल्या जीवन पद्धतीची पुनर्रचना करणे. यात आपल्याला कोणतेही कर्म बदलायचे नसून फक्त दृष्टिकोन बदलायचा आहे. कोणत्याही नवीन तंत्रज्ञानाची इथे गरज नाही. दृढनिश्चय मात्र नक्कीच हवा. पूर्वी लोक असेच जगत होते, त्यामुळे त्यांच्या जीवनात ‘आनंद’ होता.

आज मात्र प्रत्येक जण आनंदाच्या शोधात आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मनुष्याचा ‘आनंदा’चा शोध सुरु आहे. मनुष्य सकाळी झोपेतून जागे झाल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक गोष्टी करीत असतो. त्यातील बऱ्याचशा गोष्टीत तो कमीअधिक प्रमाणात यशस्वी देखील होतो तर काही गोष्टीत तो अपयशी ठरतो. दिवसभरात त्याच्या आयुष्यात सुखदुःखाचे, जयपराजयाचे अनेक प्रसंग येतात, त्याला मानापमान सहन करावा लागतो. दिवसभरातील प्रेम, माया, मोह, जिव्हाळा, आपुलकी, तिरस्कार, हेवा, मत्सर, राग, द्वेष अशा विविध भावभावनांच्या हिंदोळ्यावर आपले मन सावरण्याचा मनुष्य आटोकाट प्रयत्न करीत असतो. भावनांच्या हिंदोळ्यावर मन स्थिर ठेवणे हे अतिशय कौशल्याचे काम नसले तरच नवल !!!

कोणतीही गोष्ट कुशलतेने करायची असेल तर ते कौशल्य आत्मसात करणे क्रमप्राप्त ठरते. काही माणसे जगायचे म्हणून जगत असतात. काही मरत नाहीत म्हणून जगत असतात. काही माणसे दुसऱ्यासाठीच जगत असतात. तर मोजकी माणसे काही विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन फक्त त्या विशिष्ट उद्दिष्टासाठी जगत असतात. सर्वांचे ‘जगणं’ हे एकच असले तरी प्रत्येकाच्या जगण्याचे मूल्य मात्र भिन्न भिन्न असते आणि असे होणे स्वाभाविक आहे. स्वाभाविकच त्यांच्या जीवनाची यशस्वीताही वेगवेगळी असते. दुसऱ्याला त्रास देण्यासाठी जगणे याला आपल्याकडे ‘विकृती’ असे म्हणतात. स्वतःसाठी जगणे याला ‘प्रकृती’ असे म्हणतात तर दुसऱ्यासाठी जीवन जगणे याला ‘संस्कृती’ असे म्हणतात. सर्व संतांनी मानवी मनाचा जितका अभ्यास केला तितका अभ्यास खचितच दुसरा कोणी केला असेल. आत्म्याने गर्भवास पत्करल्यापासून गर्भावासाचा त्याग करेपर्यंत त्या आत्म्यास त्याच्या ‘स्व’स्वरूपाचे ज्ञान असते. पण एकदा का त्याने या नश्वरजगात प्रवेश केला (मनुष्याचा जन्म झाला) की मनुष्य देवाला तू कोण आहेस असा प्रश्न विचारु लागतो. ‘सोहं’ म्हणणारा आत्मा ‘कोहं’ असे म्हणू लागतो. संत असे सांगतात की देहबुद्धीमुळे मनुष्य आपल्या ‘स्व’स्वरूपाला विसरतो आणि देहदु:खात बुडून जातो. देहबुद्धीमुळेच त्याला सुख दुःख आणि आनंद यातील सूक्ष्म फरक लक्षात येत नाही आणि मग ज्याच्यात्याच्या सुखदुःखाच्या (मिथ्या) कल्पनेप्रमाणे मनुष्य आयुष्यभर नुसता भरकटत राहतो. बरेच वेळेस ह्या भरकटण्यालाच सामान्य मनुष्य सुख समजतो आणि सुज्ञ लोकं त्यास ‘भ्रम’ असे संबोधतात.

देहसोडून जाईपर्यंत अर्थात मृत्यूपर्यंत मनुष्य सुखच शोधीत असतो. पण खरंच त्याला सुख मिळतं? त्याला समाधानाचा लाभ होतो ? आज आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या मित्रांपैकी एखादा मित्र मैत्रीण सुखी आहे, समाधानी आहे असे आपल्याला जाणवतं का ? मित्रांचे सोडून देऊया, पण एकांतात बसल्यावर आपण सुखी आहोत, समाधानी आहोत असे आपल्याला क्षणभर तरी वाटते ? या प्रश्नाचे खरे उत्तर ‘नाही’ असेच द्यावे लागेल, हो न? खरंतर आपले सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले पाहिजे. आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर मला मोठे प्रश्नचिन्ह दिसत आहे की हा माणूस काहीही घडलेले नसताना आमचे का अभिनंदन करीत आहे. आपली शंका रास्त आहे. कारण समोरील मनुष्याचे कौतुक करण्याची संधी आपल्याला अनेक वेळेस अगदी विनासायास उपलब्ध होत असते, परंतु आपण आपल्याच सुखदुःखात इतके गुरफटून घेत असतो की ते आपल्या लक्षात येतच नाही. आता मूळ मुद्यावर येतो. आपले कौतुक करायला हवे कारण आपण मनातल्या मनात तरी कबूल केले आहे की आपण एखादवेळेस दुःखी नसू पण सुखी आहोत असेही नाही. आपण आता एक गृहपाठ करुया. गृहपाठ म्हणण्यापेक्षा आपण त्याला मनोपाठ असे म्हणूया. कारण आपल्याला तो आताच म्हणजे लगेच आणि आपल्या मनातल्या मनातच करायचा आहे. आपण सुखी का नाही? आपल्याला समाधान का मिळाले नाही याची काही उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न करुया. मी अवघड प्रश्न विचारत नसल्यामुळे कोणालाही आपले उत्तर प्रगट करावे लागणार नाही. असो. तर आता आपण आपले उत्तर मनात शोधले असाल. आपण शोधलेली सर्व उत्तरे अगदी बरोबरच आहेत. त्यामुळे आपल्याला शंभर पैकी शंभर गुण मिळालेले आहेत. आपण सर्व विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले आहात. तरीही एक प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर देऊनही आपण समाधानी का नाही? आपण आनंदी का नाही? आपण सुखी का नाही? आपण जगतोय की जगवले जातोय ? की नाईलाजाने दिवस ढकलतोय ? हे जीवन आपल्यासाठी नक्की काय आहे? जीवनाचा खरा अर्थ काय ? असे अनेक प्रश्न आपल्याला याआधी पडले असतील ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला अध्यात्मात मिळू शकतात.

जगातला सर्वात चांगला शब्द म्हणजे आनंद. कारण आनंद सर्वांना हवा आहे. मुख्य म्हणजे आनंद या शब्दाला विरुद्धार्थी शब्दच नाही. सामान्य मनुष्य यामध्ये सुद्धा थोडी गफलत करतो. तो सुख आणि आनंद यांची बरेचवेळेस सरभेसळ करतो. सुखदुःख हे कशावरतरी अवलंबून असू शकते किंवा अवलंबून असतेच. पण आनंद हा पूर्णपणे स्वतंत्र आहे. याच्यावर कोणाचे बंधन नाही. खरंतर आनंद आपल्या हातात असायला हवा. माझा आनंद माझ्या हातात! सुखदुःख स्थितीरुप आहे तर आनंद वृत्तीरूप आहे. मनुष्याला कुठेही कधीही कसाही, अगदी जिथे आहे तिथे, आनंद मिळू शकतो. गंमत अशी आहे की आनंद मिळण्यासाठी सर्वात मोठी आणि एकमेव आडकाठी आपली स्वतःचीच असते. कारण ‘आज रोख उद्या उधार’ या धर्तीवर आपण आनंद सुद्धा ‘उद्यावर’ टाकत असतो. अमुक गोष्ट झाली की मला आनंद मिळेल, नोकरी मिळाली की आनंद मिळेल, नोकरीत बढती मिळाली की आनंद मिळेल, अमका मनुष्य भेटला की आनंद मिळेल, अमुक व्यक्ती आयुष्याची जोडीदार म्हणून लाभली तर आनंद मिळेल, असे कितीक ‘तर’ आपण आपल्या आनंदाच्यामागे जोडतो आणि आपला आनंद उधारीवर ठेवतो, एका अर्थाने जगणंच उद्यावर टाकतो. बाहेरील जगात आनंद आहे असे समजून मनुष्य आनंद बाहेर शोधत राहतो. चुकीच्या जागी एखादी गोष्ट शोधली तर ती आपल्याला कशी मिळणार ? त्यामुळे आपण सतत रडगाणं गात असतो. वर्तमानकाळ ही आपल्याला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. रोज २४ तासांमध्ये स्वतःसाठी किमान एक तरी गोष्ट करायला हवी. उदा. आरशातला निवांत क्षण स्वतःला द्या, स्नानाच्या, जेवणाच्या वेळेचा आनंद लुटा. स्वतः गाणं म्हणा. मग आज आत्ता ताबडतोब अगदी याक्षणी उपलब्ध काय असेल तर तो फक्त आनंद !! आयुष्यातील प्रत्येक क्षण जगण्याचा प्रयत्न करुया. प्रत्येक क्षणाचा सन्मान राखत त्याचे पावित्र्य जपणे, हीच जीवन जगण्याची कला आहे. सामान्यपणे आपण दुसऱ्यांवर हक्क गाजवायचा प्रयत्नात असतो, खरंतर आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणावर राज्य करायला पाहिजे. क्षणावर राज्य करणे म्हणजे तारतम्याने विवेकाने प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया न देता ‘प्रतिसाद’ देणे. आजपर्यंत जी लोकं यशस्वी झाली आहेत त्यांनी कधीही आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणांना प्रतिक्रिया दिलेली नाही तर विवेकाने ‘प्रतिसाद’ दिला आहे.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “श्राद्ध पक्ष: एक अंधश्रद्धा…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “श्राद्ध पक्ष: एक अंधश्रद्धा☆ श्री जगदीश काबरे ☆

हिन्दू शास्त्राप्रमाणे जोपर्यंत श्राद्ध/पिंड दान होत नाही तोपर्यंत आत्म्याला स्वर्ग प्राप्त होत नाही वा मुक्ती मिळत नाही, असे समजले जाते. पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो. (१५ दिवसांचा काळ) या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात, असे मानले जाते. पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात. असे विधी करून जर खरंच आपल्या पितरांना मुक्ती मिळत असेल आणि त्यांचे आत्मे शांत होत असतील तर मग दरवर्षी हीच कर्मकांडे पुन्हा पुन्हा करण्याची गरज काय, हा प्रश्न आपल्याला का पडत नाही? 21व्या शतकात अशी कर्मकांडे करून हिन्दू समाज अंधश्रद्धेच्या भयाण अंधारात अजूनही जगत आहे, ही वैषम्याची बाब आहे. खरे तर हा लोकांच्या मनात भीती पसरवून स्वत:चे पोट भरण्याचा पारंपरिक उद्योग आहे. ब्राम्हण अणि कावळा जोपर्यंत अन्न खात नाही तो पर्यंत घरातील कुणीही व्यक्ती जेवत नाही. बरे, श्राद्ध/पिंड दान करण्यासाठी पुरुषच लागतो, स्त्रियाना तो अधिकार नाही. काय कारण? कारण काय तर म्हणे, पुराणात असे सांगितले आहे की, पुरुषानेच हे विधी केले पाहिजेत, तरच घरात सुखसमृद्धी नांदते.

१) गरुड़ पुराण :- पुत्राशिवाय मनुष्याला मुक्तता नाही. पितृपक्षात मुलाकडून पिंड दान केले नाही तर आत्मा स्वर्गात जात नाही.

२) मार्कंडेय पुराण :- घरातील मुख्य पुरुषाने आपले मृत पितर यांच्या सोबत भूत, देव अणि ब्रह्मण यांनाही अन्न दिले पाहिजे अणि असे केले तरच त्याला समृद्धी, निरोगी शरीर अणि शेवटी मोक्ष मिळतो.

ह्या तर पुरुषसत्ताक व्यवस्थेला बळकट करणाऱ्या गोष्टी आहेत. पुरुषी मानसिकतेत स्त्रियांना दुय्यम स्थान असते, म्हणूनच स्त्रियांना यातील कुठलाही विधी करता येत नाही. पण खरे पहाता, कावळा तुमचा निरोप घेऊन तुमच्या मृत पितारांकडे जात नाही की पितारांचा आत्मा कावळ्यात येत नाही. हे सगळे कर्मकांड तुमच्या मनातील भीतीचा फायदा घेऊन रचण्यात आले आहे. स्वतःला धार्मिक म्हणवणारे बरेच लोक जिवंत असतांना आपल्या आईबापांना नीटपणे जेवू घालत नाहीत, त्यांना कधी कधी तर सरळ वृद्धाश्रमाचा रस्ता दाखिवला जातो आणि ते मेल्यावर मात्र लोक काय म्हणतील या भीतीपोटी जनरीत पाळत प्रतिष्ठेसाठी जेवण घातले जाते. मग हेच लोक ब्राम्हणाला बोलावून मोठा विधी करतात आणि त्याला दक्षिणा देवून तृप्त करत आपल्या मनातील अपराधगंड शमवण्याचा प्रयत्न करतात. माणसे जिवंत असताना त्यांना छळतील आणि मेल्यावर त्यांच्या नावाने गळे काढत श्राद्ध करुन गोडघोडही खातील. असा दांभिकपणा इतर कुठल्याही नाही, पण हिंदू धर्मातच दिसतो. म्हणून धर्माच्या धंद्याचे सर्वात हास्यास्पद आणि विकृत रूप असेल तर तो आहे पितृपक्ष, श्राद्ध आणि त्यातील विधी.

पुनर्जन्म आहे असे मानले तर घरातील वडीलधारी मंडळी मृत्यूनंतर पुढच्या जन्मात कुठेतरी जन्माला आली असतीलच ना? मग त्याच वेळेस त्यांचे आत्मे अवकाशात लटकून खीर-पुरीसाठी कसे काय तळमळत असतात? जर पुढचा जन्म हा ८४ लक्ष फेऱ्यातून होणारा असेल तर सगळ्यांचे पितर नेमके कावळेच कसे काय होतात? पुनर्जन्म झाल्यावर ते अंतराळात कसे काय लटकू शकतील? हा साधा प्रश्न कुठल्याही शाळेत शिकत असणाऱ्या मुलालाही पडतो, तर मग शिक्षित आणि उच्चशिक्षित लोकांना तो का पडू नये? धर्ममार्तंडांच्या हातातले ते एवढे मठ्ठ बाहुले कसे काय होतात? 

आता आपले संत पिंडदानाविषयी काय म्हणतात ते पहा…

1) तुकाराम महाराज म्हणतात,

जित्या नाही अन्न | 

मेल्यावरी पिंडदान || 

हे तो चाळवाचाळवी ||

2) एकनाथ महाराज म्हणतात,

जिता मायबापा न घालिती अन्न|

मेल्या प्रेतावरी करिती पिंडदान ||१||

पहा पहा संसारीचा कैसा आचारु|

जिता अबोला मा मेल्या उच्चारू ||२||

जित्या मायबापा न करिती नमन | 

मेल्यामागे करिती मस्तक वपन ||३||

जित्या मायबापा धड्गोड नाही |

श्राद्धी तळण मळणपरवडी पाही ||४||

जित्या मायबापा गालीप्रदन |

मेल्या त्याचेनी नावे देती गोदान ||५||

जित्या मायबापा नेदी प्यायला पाणी| 

मेल्या पितरालागी बैसती तर्पणी ||६||

प्याया पाणी न घालिती सासरा जिता| 

पिंडापासी येती मग दंडवता ||७||

एका जनार्दनी कृपेचे तान्हे |

विधी निषेध दोन्ही आतळो नेदी माने||८||

3) संत कबीर सांगतात…

जिंदा बाप को रोटी न खिलावे, मरे बाप पछतायो…

मूठ भर चावल दाबे धर के,  कौवा बाप बुलय्यो।

4) गाडगेबाबा म्हणतात,

पिंड दान करू नका.

ही भटा-बमाणांची पोटभरी 

परंपरा बंद करा. गरिबांना अन्न द्या, त्यांच्या मुलांना शिकवा. मृत झालेल्या वाडवडिलांची स्मृति जतन करा, त्यानी केलेल्या चांगल्या कामाचे अनुकरण करा. त्यांचे चांगले विचार आत्मसात करा. हाच त्यांचा योग्य स्मृती दिन होऊ शकतो.

पण आपल्या लबाड पुरोहित पंडितांना दोन्ही हातात लाडू हवे असतात. त्यामुळे मरण्याआधी पुढच्या जन्म सुखाचा जाण्यासाठी ते विधी करायला लावतात आणि मृत्यूनंतरही पितरांचा धाक दाखवून त्यांच्या मुलांच्या सुखासाठी कर्मकांड करायला लावून त्यांच्याकडूनही आपल्या पोटोबासाठी खीर-पुरीची व्यवस्था करतात. असे केल्याने सुख-समृद्धी येईल असा दावा केला जातो. परंतु इतिहास साक्षी आहे की, हजारो वर्षे हे सर्व करूनही ही धार्मिक माणसे गरीबच राहिली आहेत. जे मुळातच श्रीमंत आहेत ते पितरांच्या नावाखाली फक्त आपल्या जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी श्राद्ध पक्ष करत असतात. म्हणूनच श्राद्धाचे सोंग प्रत्येक घराघरात अत्यंत उसन्या गांभीर्याने केले जाते… तेही सु(?)शिक्षित कुटुंबात! खरंच किती लाजीरवाणा प्रकार आहे हा!!

सगळ्यात गमतीशीर गोष्ट म्हणजे कावळ्यात आपल्या पितरांचा आत्मा येतो म्हणे! कावळा हा पक्षी मेलेले मासे, उंदीर, बेडूक, सडलेले मांस इत्यादी टाकाऊ घाण खाऊन परिसर स्वच्छ करत असतो. तो मांसाहारी जास्त अन् शाकाहारी कमी, हे सत्य लोकांना माहीत असूनही कावळ्याला शाकाहारी समजून, त्यात पूर्वजांचे आत्मे आल्याची अफवा पक्की करून पितृपक्षाचा खेळ मांडला जातो. जो कावळा 12 महीने घाण खातो तोच कावळा एका दिवसापुरता शुभ आणि शुद्ध कसा होतो? ह़ा विरोधाभास आपल्या लक्षात का येत नाही?

तुम्ही जर पिंडदान विधीचे नीट निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल की…….

  1. भटजी कार्यक्रम सकाळी लवकर घ्यायला सांगतात. कारण कावळे भुकेपोटी सकाळी पटकन येतात. एकदा पोट भरल्यानंतर भुक लागल्याशिवाय कोणताही प्राणी/पक्षी लगेच परत परत खात नाही.
  2. भटजींचा दुसरा सल्ला हा असतो की, कार्यक्रम तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी घ्या. याचे कारण तेथे दररोजच असे कार्यक्रम होत असतात. त्यामुळे तेथील कावळ्यांच्या हे अंगवळणी पडलेले असते. त्यांना सविनय हे कळलेले असते की माणसांची गर्दी असली तरी ते आमचे आपल्याला काही करत नाहीत म्हणून त्यांच्यात गर्दीतही माणसांच्या जवळ येण्याचे धारिष्ट्य आलेले असते. कारण दररोज ठरलेल्या वेळी त्यांना आयते खाणे मिळत असते.
  3. कार्यक्रम घरी घेतल्यास तेथील कावळ्यांना हा विषय परीचीत नसतो. ते अन्नाच्या वासामुळे येतात; पण माणसांचं नक्की काय चाललयं हे त्यांना कळत नाही आणि ते माणसांना भिऊन झाडावरून खाली येत नाहीत. पण माणसं दूर गेली की हेच कावळे पटापट खाली येतात.
  4. कार्यक्रमाला उशीर झाल्यास कावळ्यांनी काही तरी खाल्लेले असतेच, त्यामुळे त्यांचे पोट भरलेले असल्यानेही ते सहजासहजी पिंडाजवळ येत नाहीत.
  5. बरे, कावळ्यात आत्मा असतो असे मानल्यास मुस्लीम, ख्रिश्चन धर्माच्या लोकांच्या आत्म्यांचे काय? ते कावळे वेगळे असतात काय? आणि तसे असलेच तर भटजींना कसे कळते हा हिंदू कावळा आहे? आणि त्याच यजमानाच्या पितराचा आहे? कावळ्यांनी काय फक्त हिंदुंच्याच आत्म्यांचाच ठेका घेतलाय का?
  6. तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी कार्यक्रम चालू असताना बघा. एकच कावळा अनेक पिंडावरचा भात खातो. म्हणजे एकाच कावळ्यात अनेक आत्मे आहेत असे म्हणायचे का? दुसऱ्या दिवशी परत कावळा आत्म्यांची आदलाबदल करतो का? भात खाणाऱ्या कावळ्याचा आत्मा स्त्रीचा की पुरूषाचा कसे ओळखायचे?
  7. या अशा निरीक्षणावरून आपल्या हे सहज लक्षात येते की, ही 100% अंधश्रध्दा आहे. भट-पुरोहितांनी धर्माच्या नावाखाली अज्ञाताच्या भीतीपोटी लोकांना या कर्मकांडात गुंतवून स्वत:ची पोटे भरण्यासाठी काढलेली लुटीची दुकानं आहेत. तेव्हा जागे व्हा आणि 21व्या शतकातला वैज्ञानिक विचार जगायला शिका. विज्ञानाची सृष्टी घेतली तशी विज्ञानाची दृष्टीसुद्धा घेतली तरच आपला निभाव लागणे शक्य आहे; हे आपल्या जेवढ्या लवकर लक्षात येईल तो सुदिन.

“शहाण्यांचा मूर्खपणा अर्थात् आपले प्रेतसंस्कार” या ‘सुधारका’तील लेखात आगरकर म्हणतात, “हिंदूंनो, तुम्ही इतके गतानुगतिक कशासाठी होऊन बसला आहांत? मनुष्याच्या जन्माला येऊन असे मेषासारखे वर्तन का करता? डोक्यात जो मेंदू आहे त्याची माती का होऊ देता? जिवंत माणसाच्या आहारास लागणारे पदार्थ तुम्ही मेलेल्या माणसास अर्पण करता याचा अर्थ काय? मृत शरीराची राख झाल्यावर त्याच्या नावाने तुम्ही जें अन्न-पाणी देतां त्याचा उपभोग कोण घेतो? आत्म्याला नाक, तोंड, पोट असे अवयव असतात का? असतील तर जिवंतपणा आणि मृतावस्था यांत भेद काय? खुळ्यांनो! असे पोराहून पोर कसे झालांत?” 

विचार तर कराल…!?

(या लेखातील मते लेखकाची वैयक्तिक मते आहेत. त्याच्याशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. तसेच लेखकाने हा लेख कोणाच्या भावना दुखावण्यासाठी लिहिलेला नसून लोकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाने विचार करावा म्हणून लिहिलेला आहे.) 

©  जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग २७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग २७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- ” इथे तुझी भरभराट होणाराय. बघशील तू. माझे आशीर्वाद आहेत तुला”

 सरांनी‌ मनापासून दिलेल्या आशिर्वादांचे हे शब्द सरांच्या मनातल्या तत्क्षणीच्या भावना व्यक्त करीत होते हे खरेच. पण त्याच शब्दांत नजीकच्या भविष्यकाळात घडून येणाऱ्या अनेक उत्साहवर्धक घटनांचे भविष्यसूचनही लपलेले होते याचा प्रत्ययही मला लवकरच येणार होता याची मात्र मला त्याक्षणी पुसटशीही कल्पना नव्हती! )

माधवनगरला अतिशय प्रशस्त अशा ब्रॅंच-मॅनेजर क्वार्टर्स होत्या. त्याही ब्रॅंचला जोडून. मधे फक्त एक काॅमन दरवाजा. त्यामुळे येण्याजाण्याचा वेळ तर वाचायचाच शिवाय एरवीच्या मोकळ्या वेळेत किंवा सुट्टीच्या दिवशीही महत्त्वाचा पत्रव्यवहार विचारपूर्वक हातावेगळा करायला मला भरपूर निवांतपणाही मिळायचा. असे सौख्य मला ना पूर्वी कधी अनुभवायला मिळालं होतं आणि ना नंतरही. त्यामुळे माधवनगर ब्रॅंचमधलं प्रचंड वर्कलोडही मला सुसह्य झालं होतं. माझ्यासाठी आणखी एक अतिशय समाधानाची बाब म्हणजे नाईकसरांचं घर आमच्या बॅंकेच्या अगदी जवळ म्हणजे समोरचा रस्ता ओलांडला की त्याला लागूनच होतं. त्यामुळे आमची रोजच भेट व्हायची. त्यांच्या नित्य भेटी, विविध विषयांवरील गप्पा हा माझ्यासाठी विरंगुळाच नव्हे तर एक प्रकारचा सत्संगच असायचा. सरांची ‘आध्यात्मिक आणि साहित्यक्षेत्रातली अधिकारी व्यक्ती’ ही ओळख माझ्यासाठी नवीन होती. त्यांचं बोलणं अतिशय शांत, लाघवी आणि ओघवतं असे. त्यांच्याशी अल्पकाळाचं मोजकं बोलणंही एक वेगळीच ऊर्जा देऊन जात असे. माझ्या मनातल्या कितीतरी शंकांचं निरसन अनेकदा त्यांना नेमकं कांही न विचारताही त्यांच्याकडून नकळत आपोआपच केलं जातं असे. तो अतिशय विलक्षण अनुभव असायचा!

माझ्या सासुरवाडीच्या सर्वांशीही नाईक-कुटुंबियांचा परिचय आणि जवळीक होतीच. त्यामुळे मी महाबळ कुटुंबाचा जावई असणं ही सरांसाठी विशेष कौतुकाची बाब असे. त्यामुळे पहिल्या भेटीनंतरच्या लगेचच्या निवांत भेटीतच सरांनी आरती/सलिलची आवर्जून चौकशी केली होती. तिची नोकरी, राजीनामा, जूनमधलं फॅमिली शिफ्टिंग हे सगळं त्यांना सांगितलं तेव्हा ते विचारात पडले.

“हे बघ, इथलं नवीन शैक्षणिक वर्ष लवकरच सुरू होईल. अनेक शाळांमधल्या नवीन भरतीबद्दलच्या जाहिराती यायला सुरुवात होईल. आपल्या सांगली शिक्षण संस्थेच्या शाळांमधेही नवीन जागा भरायच्यात. अशा जाहिरातींकडे लक्ष ठेवून आरतीला तिथूनच तुझा इथला पत्ता देऊन ताबडतोब अर्ज करायला सांग. कारण ती इथे आल्यानंतर अर्ज करायचा म्हणशील तर मुदत संपून गेलेली असेल. अनुदानित शाळेतली नोकरी सोडल्यानंतर सहा महिन्याच्या आत जर दुसऱ्या अनुदानित शाळेत पुन्हा नोकरी मिळाली तरच पहिल्या नोकरीतली सिनिऑरिटी आणि इतर फायदे सुरक्षित राहू शकतात. त्यामुळे ही संधी सोडू नको म्हणावं. “

पुढे एकदोन दिवसांत ते म्हणाले तशी सांगली शिक्षण संस्थेची आणि सांगलीच्याच वुईमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या रा. स. कन्याशाळेची अशा दोन जाहिराती माझ्या वाचनात आल्या तेव्हा त्याची कटिंग्ज महाबळेश्वरला आरतीकडे पाठवून मी तिला सरांचा निरोपही कळवला. दोन्हीकडे आरतीने लगेच अर्जही केले. जूनच्या पहिल्या आठवड्यात ती इकडे येण्यापूर्वीच दोन दिवस आधी तिची दोन्हीकडची इंटरव्ह्यूची काॅललेटर्स माझ्या पत्यावर येऊन पडली होती!’देता घेशील किती दो कराने’ ही उक्ती कृतीत दृश्यरुप होणं म्हणजे नेमकं काय याचा सुखद अनुभव मला आला तो दोन्हीकडे आरतीची सिलेक्शन झाल्याची बातमी आली तेव्हा!

महाबळेश्वरहून परतल्यावर लगेचच वेध लागले ते दोन्हीपैकी एक प्रस्ताव विचारपूर्वक निवडून नवीन रुटीनला सामोरं जायच्या तयारीचे. सांगली शिक्षण संस्थेत पहिलं पोस्टींग सांगलीतल्या शाळेतच होणार होतं. तरीही पुढे कधीही जिल्हाभर विखुरलेल्या संस्थेच्या कोणत्याही शाळेत होऊ शकणाऱ्या बदल्या गृहित धरुन सांगलीतल्या कायमच्या वास्तव्याची खात्री असणारी रा. स. कन्याशाळेची आॅफर आम्ही पूर्ण विचारांती स्विकारायचं ठरवलं आणि आम्हा तिघांचीही नव्या रुटीनला सामोरं जायची तयारी सुरु झाली.

सलिलची ‘बापट बाल शिक्षण मंदिर’या शाळेतली दुसरीतली अॅडमिशन, आरतीची एक जूलैपासून सुरु होणारी नवीन नोकरी, दोघांचंही सांगलीला जाण्यायेण्यातलं धावपळीचं रुटीन आणि अशा जाण्यायेण्याच्या त्रासापासून पूर्णत: मुक्त असणारं माझं निवांत, स्वस्थ वेळापत्रक हे सगळं मला पुढे कितीतरी दिवस स्वप्नवतच वाटत राहिलं होतं! पण या स्वप्नातून अचानक दचकून जाग यावी तसा मी भानावर आलो ते केवळ हे असं कौटुंबिक स्थैर्य मिळणं सोयीचं व्हायला निमित्त व्हावं एवढ्यापुरत्या अगदी अल्पकाळासाठीच माझी इथे माधवनगरला बदली झाली असावी असं वाटायला लावणारी एक बातमी अचानक ब्रॅंचमधे येऊन धडकली तेव्हा! इथं येऊन मला चारसहा महिनेही झाले नव्हते आणि पुढच्या प्रमोशन प्रोसेसच्या हालचाली सुरु झाल्याची ती बातमी होती! 

सगळं प्रोसेस पूर्ण व्हायला चार एक महिनेच लागणार होते. प्रमोशनची संधी हा आनंदाचा भाग असला तरी माझ्यापुरता विचार करायचा तर प्रमोशन नंतरची ‘आऊट ऑफ स्टेट पोस्टींग’ ची टांगती तलवार माझ्या संकल्पसिध्दीत फार मोठा अडसर निर्माण करणारी ठरणार होती आणि हेच माझ्या मनात डोकावू लागलेल्या अस्वस्थतेचं मुख्य कारण होतं. घरचं हसरं वातावरण पाहिलं कीं हे सगळं घरी सांगायचं मी टाळतंच होतो. जे व्हायचं तेच होणार असेल तर आत्तापासूनच सगळ्यांना याचा त्रास कशाला असा विचार करुन मी स्वतःचीच समजूत काढत रहायचो.

ब्रॅंचमधल्या दिवसभराच्या कामांमधली व्यस्तता सोडली तर एरवी मनात नजीकच्या काळात निर्माण होऊ शकणाऱ्या अस्थिरतेचा विचार ठाण मांडून असायचाच. एक दिवस न रहावून मी नाईकसरांना माझ्या मनातली ही बोच बोलून दाखवली. त्यांनी नेहमीच्या शांतपणे हसतमुखाने सगळं ऐकून घेतलं. म्हणाले, “यालाच तर आयुष्य म्हणायचं. ते येईल तसं आनंदाने स्विकारायचं. जिथे जाशील तिथे दत्तमहाराज आहेतच ना पाठीशी?मग काळजी कसली? ते असणारच आहेत. आणि म्हणूनच तुझ्या उत्कर्षाची वाट वळणावळणांची असणाराय. खाचखळग्यांची नाही हे लक्षात ठेव”

त्यांचे हे नेमकी दिशा दाखवत मला निश्चिंत करणारे आश्वासक शब्द त्याक्षणी माझ्यासाठी अतिशय दिलासा देणारे होते! 

माझी यापुढची उत्कर्षाची वाट वळणावळणाची असणाराय असं सर म्हणाले ते अनेक अर्थांनी खरं ठरणार होतं आणि त्या वाटेवरचं पहिलं वळण हाकेच्याच अंतरावर माझी वाट पहात तिष्ठत थांबलेलं. पण आता मी निश्चिंत होतो. मनात उत्सुकता होतीच पण ना कसलं दडपण ना अस्वस्थता. कारण सर म्हणाले तसं ‘तो’ होताच माझ्या सोबत आणि समोरच्या त्या वळणवाटेवरही तो असणारच होता सोबतीला.. !

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रिय मित्र प्रदीप… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? विविधा ?

☆ प्रिय मित्र प्रदीप… ☆ श्री सुनील देशपांडे 

प्रिय मित्र प्रदीप,

कालपासून फक्त डोळ्यातून पाण्याच्या धारा वहात आहेत. गळा गदगदून आला आहे. तुझ्याशी बोलण्याची खूप इच्छा होती. तू तिकडे साता समुद्रा पार! कुणास ठाऊक रात्र आहे की दिवस आहे आणि माझ्याही तोंडातून शब्द निघणे अशक्य होते आहे. टीव्हीवर वर्तमानातील सत्य पाहिल्यानंतर भूतकाळाचा इतिहास नजरेसमोरून सरकत आहे. ऊर अभिमानाने भरून आला आहे. आपण आज जिवंत आहोत हे केवढे मोठे भाग्य ! 

या क्षणी आपले मित्र जे आज हयात नाहीत पण आपल्याबरोबर होते, अशांच्या सुद्धा आठवणी मनात दाटून येत आहेत. बालपणापासून आपल्या परिस्थितीच्या आठवणी येत आहेत, अर्थात आपली परिस्थिती ही देशाच्या आर्थिक परिस्थितीवरच अवलंबून असणार. त्यामुळे या सर्व परिस्थितीचा विचार करता लहानपणी अमेरिकेच्या मदतीचा रेशनवर तासंतास उभे राहून मिळवलेला निकृष्ट प्रतीचा गहू, मिलो, मका असे पदार्थ खाण्याची वेळ मध्यमवर्गीयांवर सुद्धा आली होती. या परिस्थितीतून आपला देश आजच्या परिस्थितीवर आला आहे. लहानपणी दिवाळीसाठी प्रत्येकी ४०० ग्रॅम जादा साखर मिळेल अशी बातमी आज मुलांना, नातवंडांना सांगितली तर त्यांना हसू येते. पण ती वस्तुस्थिती आपण विसरू शकत नाही. या सर्व परिस्थितीतून आपल्या आई-वडिलांनी आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाच्या सोयी व संधी आपल्या स्वतंत्र देशामध्ये चांगल्या प्रकारे उपलब्ध झाल्या हे आपले केवढे मोठे भाग्य !

महाविद्यालयीन शिक्षणानंतर तू इस्रो मध्ये जॉईन झाल्याचे ऐकल्यानंतर आणि आर्यभट्ट च्या शास्त्रज्ञांच्या टीम मध्ये तुझी निवड झाल्याचे समजल्यानंतर सर्वप्रथम आमचा उर अभिमानाने भरून आला होता. आता तुला परत बाळू म्हणून हाक मारून मिठी घालता येईल का हा प्रश्न आम्हाला पडला होता. परंतु त्यानंतरच्या कित्येक वर्षानंतर झालेल्या भेटीने तू त्याचे उत्तर दिलेस. परंतु सुरुवातीच्या काळात पेपरमध्ये आलेल्या बातम्या पाहून मन व्यथित होत होते. तसेच अभिमानाने भरूनही येत होते. थुंबा स्पेस सेंटर मध्ये सुरुवातीच्या काळात रॉकेटचे पार्ट असेंब्ली साठी सायकल आणि बैलगाडी मधून नेत असलेले फोटो बघून मन व्यथितही होत असे आणि अभिमानाने भरूनही येत असे. अशा परिस्थितीतून आपण मंगळ आणि चंद्र यांच्या यशस्वी मोहिमा आणि तेही एखाद्या पाश्चिमात्य चित्रपटाच्या बजेट पेक्षा कमी बजेटमध्ये यशस्वी करून दाखवल्या ही आपल्या देशाला आपण ज्या परिस्थितीतून वर आलो त्या परिस्थितीने दिलेली देणगी आहे असे नाही का वाटत ?

हे सर्व आठवून, आठवून डोळ्यातून निघणारे पाणी अजूनही थांबत नाही. मी प्रचंड भावुक झालो आहे. तुला कशा परिस्थितीतून इस्रो वर आली हे जास्त चांगले माहित आहे. आम्ही फक्त पेपरमधून वाचलेल्या बातम्यांवर मत बनवणारी माणसं. पण तरीही या सर्व शास्त्रज्ञांनी शून्यातूनच नव्हे तर शून्यापेक्षाही खालून या सर्व गोष्टींना जो उठाव मिळवून दिला त्याबद्दल त्यांना किती वंदन करू हेच समजत नाही. तुम्ही सर्व सुरुवातीच्या टीममध्ये होतात तुम्ही पायवाट निर्माण केली. आता त्याचा राजमार्ग झाला. नव्हे अंतराळ मार्ग झाला. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जगामध्ये पहिल्यांदाच पंधरा-वीस मिनिटे का होईना सैर करणारा माणूस हा शिवकर बापूजी तळपदे हा भारतीय होता हे आठवल्याशिवाय राहत नाही. त्याच्या आयुष्यावर ‘हवाईजादा’ नावाचा एक चित्रपट निर्माण झालेला आहे. तो युट्युब वर उपलब्ध आहे. परंतु तोही किती जणांनी पाहिला आहे कुणास ठाऊक ? ही काल्पनिक गोष्ट नव्हे तर त्याकाळची वस्तुस्थिती आहे, हे सुद्धा कित्येक जणांना माहीत नाही. ब्रिटिश गॅझेट मध्ये त्याचा उल्लेख आहे. त्या काळच्या केसरीमध्ये त्याबाबतच्या बातम्या आहेत. त्यामुळे हे सत्य नाकारता येत नाही.

राइट बंधूंच्या आधी अधांतरी सफर करणारा पहिला भारतीय आज आठवतो आहे. त्यांनी जे विमान ‘मरुत्सखा’ नावाने बनवले होते ते सोलर पॉवर वर चालले होते हे सुद्धा विशेष! कारण आज या अंतराळ मोहिमेत सोलर पॉवर चा खूप मोठा उपयोग केला गेला आहे.

या सगळ्या स्मृती एकत्र दाटून येत आहेत. खरं म्हणजे मला माझ्या भावना नीट पणाने मांडताच येत नाहीत. मनात खूप दाटून आले आहे. खूप बोलायचं आहे. खूप व्यक्त करायचं आहे. परंतु कसं करावं समजत नाही. एखाद्या वेळेस हे ॲब्सर्ड वाटत असेल. पण काय करू ? व्यक्त झाल्याशिवाय राहवतही नाही. भावना समजून घ्याव्यात. अर्थात हे तुला वैयक्तिक नव्हे तर हे जाहीर पत्र आहे. माझ्या सगळ्या मित्रांना सगळ्या ओळखीच्यांना या सगळ्या भावना समजाव्यात म्हणून हे तुझे पत्र मी सगळ्यांनाच पाठवीत आहे. परंतु तुझ्या त्याकाळच्या किंवा इसरोमधील शास्त्रज्ञ मित्रांना ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांच्यापर्यंत आमच्या भावना पोहोचवाव्यात ही विनंती. कालच मी यावर एकच पोस्ट टाकली होती ती अशी

इस्रोच्या सर्व आजी-माजी शास्त्रज्ञ वैज्ञानिक इंजिनियर्स जे जे कोणी सर्व तांत्रिक गोष्टी शून्यातून उभे करण्यामध्ये यशस्वी झाले आहेत. त्या सर्वांना माझे साष्टांग नमस्कार. मनापासून वंदन, वंदन, वंदन.

एकच शब्द माझ्या तोंडून फुटत होता या सर्वांसाठी…

 !! नम….. नमस्तुभ्यम ! नमस्तुभ्यमस्तुभ्यम !!!

या क्षणी वसंत बापटांची एक कविता आठवते आहे त्याचा उल्लेख करतो,

*

गतकाळाची होळी झाली, धरा उद्याची उंच गुढी

पुराण तुमचे तुमच्यापाशी, ये उदयाला नवी पिढी ॥

*

ही वडीलांची वाडी तुमची तुम्हास ती लखलाभ असो

खुशाल फुटक्या बुरुजांवरती पणजोबांचे भूत वसो

चंद्रावरती महाल बांधू, नको आम्हाला जीर्ण गढी ॥१॥

*

देव्हाऱ्यातील गंधफुलांतच झाकून ठेवा ती पोथी

अशी बुद्धीची भूक लागता कशी पुरेल अम्हा बोथी

रविबिंबाच्या घासासंगे हवी, कुणाला शिळी कढी? ॥२॥

*

शेषफणेवर पृथ्वी डोले! मेरूवरती सूर्य फिरे!

स्वर्गामध्ये इंद्र नांदतो! चंद्र राहूच्या मुखी शिरे!

काय अहाहा बालकथा या, एकावरती एक कडी ॥३॥

*

दहा दिशांतून अवकाशातून विमान अमुचे भिरभिरते

अणूरेणूंचे ग्रहगोलांचे रहस्य सारे उलगडते

नव्या जगाचे नायक आम्ही, तुम्ही पुजावी जुनी मढी ॥४॥

*

गतकाळाची होळी झाली, धरा उद्याची उंच गुढी

पुराण तुमचे तुमच्यापाशी, ये उदयाला नवी पिढी ॥

जुन्या पिढीला वंदन आणि नव्या पिढीला सलाम !

कालच्या चंद्रयान मोहिमेवर बऱ्याचशा राजकीय टिपण्या आज वाचल्या आणि वाईट वाटले. विज्ञान, संशोधन, तंत्रज्ञान हे राजकारणाचे विषय नाहीत हे जोपर्यंत आपल्या लोकांना समजणार नाही तोपर्यंत आपल्या दुर्दैवाचे फेरे थांबतील का? असा प्रश्न पडतो. तुमचे राजकीय मत काही असेल तरीसुद्धा वैज्ञानिक मत एकच असते आणि तेच असले पाहिजे. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक व्यवहारांमध्ये राजकारण न आणता जगू शकत नाही का ? अत्यंत वाईट वाटते आणि या राजकीय गोष्टींचा कंटाळाच येऊ लागतो. असो वस्तुस्थितीला आपला इलाज नाही आणि आपल्या मताशी इतर माणसे सहमत असतीलच असेही नाही. त्यामुळे जे असेल ते स्वीकारत, परंतु या यशस्वितेच्या आनंदात आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या या अत्युच्च क्षणाचा साक्षीदार झाल्याच्या आनंदात, भविष्यात केव्हाही आता मृत्यू आला तरी आनंदाने सामोरे जावसं वाटेल यात शंका नाही.

जय हिंद! भारत माता की जय !!

तुझा प्रिय मित्र,

सुनील

(माझा तिसरीपासून ते कॉलेज पर्यंतचा वर्गमित्र प्रदीप शिंदे, जो पूर्वी इस्रो या संस्थेमध्ये नोकरी करीत होता. भारताच्या यशस्वी चंद्र मोहीमेनंतर त्यास पाठवलेले हे पत्र. मुद्दाम सर्वांच्या माहितीसाठी प्रकट करीत आहे)

© श्री सुनील देशपांडे

पुणे, मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पांगळेपण… ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

☆ पांगळेपण… ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

भारत विकास परिषदेच्या सांगली शाखेने परवाच घेतलेल्या शिबिरात 138 दिव्यांगाना अत्याधुनिक मोड्युलर हात व पाय बसविले. अर्थात यात बऱ्याच इतर संस्था पण सहभागी होत्या. पण सांगलीतल्या या संस्थेत माझा भाऊ कार्यरत असल्याने माझी कॉलर जरा ताठ झालीच. त्याने सांगितलेल्या दिव्यांगांच्या एकेक गोष्टी ऐकून थोडं हळवं मन उदास झालं. पण ही माणसं किती चांगलं काम करताहेत याचं कौतुकही वाटलं.

सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने त्याच वेळी माझ्या हातात आशा बगे यांचा मारवा कथासंग्रह होता. त्यातली पांगळी ही कथा वाचली. पांगळेपण फक्त शरीराचं नसतं ते मनालाही येत असतं. ग्रेस यांनी ते फार छान सांगितलं आहे. सत्यभामा व रुक्मिणी दोघीही मनाने पांगळ्या होत्या. कृष्णाचं प्रेम पारिजातकात शोधत होत्या. एकीला वाटलं मूळ असून काय उपयोग, फुलेच मिळाली नाहीत तर ! दुसरीला वाटले मूळच मिळाले नाही तर ही बेभरवशाची फूले काय कामाची! राधेला मात्र असं प्रेमाचं प्रतीक शोधावं लागलं नाही, ती स्वत:च कृष्णमय होऊन प्रेमाचं प्रतीक बनली.

आशा बगे यांच्या कथेत एक प्रथितयश कवी, त्याला भेटलेल्या एका उदयोन्मुख तरुण कवियित्रिला पुढे येण्यासाठी आधार द्यायचा असं ठरवतो. देतोही!आणि एका क्षणी तो तिला आपलं बोट सोडायला सांगतो, कारण त्याला वाटतं कि तिला आता आपल्या आधाराची गरज नाही. पण जेंव्हा ती प्रत्यक्षात बोट सोडून जाते, तेंव्हा त्या कवीला इतकं एकटेपण येतं कि तो विचार करू लागतो, नेमकं आपण तिचं बोट सोडलं कि तिनं आपलं बोट सोडलं ? पांगळेपण आपल्याला कां आलं ? 

ही अवस्था प्रत्येकजण अनुभवत असतोच. ज्या मुलांचं बोट धरून आपण त्यांना चालायला शिकवतो, त्यांचं बोट सुटतं तेंव्हा आपण पांगळे झालेलो असतो. आणि मग लाखभर अपेक्षांचं ओझं त्या मुलावर टाकतो. खरंतर आपण बोट ज्या हातानं धरलेलं असतं, तो हात हळूहळू त्याच्या खांद्यावर न्यावा. कारण मैत्र कधीच कुणाला पांगळं करत नाही. प्रेम, सहानुभूती, कणव या भावना पांगळेपण वाढवणाऱ्या असतात. अहंकार, मोठेपणा जपण्याची हौस, अधिकार गाजवण्याची गरज, दुसऱ्याच्या कमतरतांवर बोट ठेवण्याची सवय, दुसऱ्याचे दोष अधोरेखित करण्याचे प्रयत्न स्वतःलाच एक दिवस पांगळं बनवतात.

शरीराचं पांगळेपण घालविणारं कोणीतरी नक्की भेटेल पण मनाचं पांगळेपण आपलं आपणच घालवावं लागेल किंबहुना ते येणारच नाही याची काळजी घ्यावी लागेल, तसे आधीच प्रयत्न करावे लागतील.

मनके हारे हार है, मनके जीते जीत। 

कहत कबीर हरी पाइये, मनही की परतीत॥

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पर्णाच्छादित वाट… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर ☆

सुश्री सुलभा तेरणीकर

🔅 विविधा 🔅

☆ पर्णाच्छादित वाट… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर 

अतीतातून काही चित्रे डोकावतात. काबुलीवाला.. तो तर आपल्याला खास. त्यातल्या मिनी साठी दाखवला होता. काबुली वाल्याला ती मिनी विसरून जाते. तशी मीही तो चित्रपट विसरले.

थोड्या मोठेपणी मामा वरेरकर यांनी अनुवादित केलेल्या टागोरांच्या कथा वाचल्या.

पोस्टमास्टर, नष्ट नीड, एक रात्र, क्षुधित पाषाण, गुप्त धन, रासमनी चा मुलगा, दृष्टिदान, समाप्ती…. अशा कितीतरी.. त्यांनी मनाचा ठाव घेतला होता. पण कालांतराने त्या वर विस्मरणाचे धुके जमले….

टागोरांच्या कथा कालांतराने पुन्हा हाती पडल्या तेव्हा झपाटल्या सारख्या पुन्हा वाचल्या. पुन्हा पुन्हा वाचल्या. त्यातल्या अंतरंगाशी पुन्हा मन जडले.

तुरुंगातून सुटून आलेल्या रहमत पठाणला लहानपणी त्याच्याशी खूप बोलणारी मिनी भेटतच नाही. ती एक नववधू झालेली असते….

टागोरांची कथा इथे संपत नाही. मिनीचे वडील पठानाच्या मनाला जाणतात. दूरदेशी असलेल्या त्याच्या मुलीला त्याने भेटावे म्हणून मोठी रक्कम त्याला देतात.

उत्सव समारंभाच्या यादीतल्या हिशोबात, दान दक्षणेच्या आकड्यात काटछाट करावी लागते. पूर्वी ठरल्या प्रमाणे विजेचे दिवे लावता येणार नव्हते. वाजंत्री वालेही आले नव्हते. बायका मंडळी ही नाराज झाली होती.

पण मंगल प्रकाशाने आमचा शुभोत्सव अधिक उज्ज्वल झाला असे वाटले….

बलराज साहनी ने काबुली वाला अजरामर तर केला होताच. पण कथेचे सूत्र मिनीच्या वडिलांच्या मनोगतात किती रेखीव झालं होत.

पोस्ट मास्तर या कथेतील एक पोरकी पोर रतन.. गावातल्या पोस्टमास्टर साठी किरकोळ कामे करीत असे. मास्तर एकदा आजारी पडल्यावर ही मुलगी मोठी झाल्यासारखी त्यांची शुश्रुषा करते.

पोस्टमास्टर बरे झाल्यावर नोकरीचा राजीनामा देऊन जायला निघाल्यावर त्या मुलीचा निःशब्द दुःखावेग बाहेर पडतो.

दोनच पात्रे असलेल्या या कथेत काही हृदय पिळवटून टाकण्यासारखे असे काही नाही. म्हणूनच त्या मुलीचे दुःख आपल्या मनात खोलवर जाते…. या कथेची पार्श्वभूमी बंगालच्या ग्रामीण भागातला मलेरियाग्रस्त कोपरा आहे. पण तो तसा उरत नाही. तो रतनची मूक भाषा होतो. तिची असीम निष्ठा होती

…. ते होडीत बसले आणि होडी चालू लागली. पावसाळ्याने उसळलेली नदी धरणीच्या उमाळलेल्या अश्रुंच्या पाझरासारखी चारी बाजूने सळसळू लागली. त्यावेळी त्यांच्या हृदयात एक अत्यंत बिकट वेदना जाणवली एक सामान्य गावंढल बालिकेचा चेहरा जणू काही एक विश्वव्यापी प्रचंड अव्यक्त मर्मकथा प्रकाशित करत होता…

मूळ बंगाली भाषा सौंदर्याची जान नव्हती पण अनुवादित मराठी भाषेच्या आधाराने मी ते पुन्हा अनुभवले. महाकवीच्या प्रतिभेच्या पाऊलखुणा पुन्हा शोधल्या.

खुद्द गुरुदेव टागोरांनी या कथा पुन्हा वाचल्या तेव्हा 32 सालच्या एका पत्रातून ते लिहितात…. जेव्हा मी बंगालच्या खेड्यातल्या निसर्गाला सामोरा गेलो तेव्हा माझ्या सुखाला पारावार उरला नाही… या साध्या कथात हाच आनंद भरून राहिला आहे.. ग्रामीण बंगालच्या त्या प्रेमळ आतिथ्य शीलतेला मी आता मुकलो आहे. त्यामुळे मोटारीतून मिरवणाऱ्या माझ्या लेखणीला त्या साहित्याच्या पर्णाछादित शीतल वाटा चोखळणे या पुढे शक्य होणार नाही….

1891 ते 1895 तर काही 1914 ते 1917 या काळात म्हणजे त्यांच्या निर्मितीच्या ऐन बहराच्या काळात लिहिलेल्या या कथा आहेत.

ऐन तारुण्यात वडिलोपार्जित जमिनीची व्यवस्था पाहण्यासाठी ते सियालढा, पटिसार, शाजाद पूर, अशा खेड्यातून, तर पद्मा मेघना नद्यांतून, हाऊस बोटीतून प्रवास करीत आपल्या रयतेला भेटायला जात. बंगालचे अनुपम सृष्टी सौंदर्य न्याहाळता, त्यांच्या सुखदुःखाच्या कथा ऐकत. त्याचं प्रतिबिंब या कथात पडलेलं आहे.

1895 च्या 25 जूनला लिहिलेल्या एका पत्रात ते सांगतात, मी आता गोष्ट लिहायला बसलो आहे आणि जसजसे शब्द पूढे सरकता आहेत तसतसा भोवतालचा प्रकाश, सावल्या आणि रंग बेमालूम मिसळत आहेत. मी जी दृश्य घटना कल्पित आहे, त्यांना हा सूर्य हा प्रकाश हा पाऊस, नदीकाठचा वेळू, पावसाळ्यातले आकाश, हिरव्या पानानी आच्छादलेले खेडे, पावसानी समृध्द केलेली शेते यांची पार्श्वभूमी मिळून त्याचं वास्तव अधिक चैतन्यपूर्ण होत आहे….. या खेड्यातली निःशब्द ता जर मी वाचकांपुढे उभी शकलो, तर. माझ्या कथेतील सत्य क्षणार्धात त्यांना पूर्णपणे उमगेल…

फारा वर्षाने का होईना, महाकवी चे शब्द माझ्या समवेत घेते. त्यांच्या लेखणीच्या पर्णाछादित लेखणीच्या वाटा चालू लागते………. मृण्मयी चारुलता कादंबिनी यांच्या खेळात मीही सामील होते….

©  सुश्री सुलभा तेरणीकर

मो. 8007853288 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पितृपक्ष — नवा विचार ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? विविधा ?

☆ पितृपक्ष — नवा विचार ☆ सौ राधिका भांडारकर ☆

गणपती बाप्पाचे विसर्जन होते आणि त्यानंतरचा पुढचा पंधरवडा पितृपक्ष म्हणून मानला जातो.

भाद्रपद महिन्यातल्या कृष्ण पक्षातले हे पंधरा दिवस पितरांच्या स्मरणार्थ व्यतीत केले जातात.

आत्मा अमर आहे हे आपण मानतो. तसेच मृतात्म्यांचे ऋणानुबंध, मृत्यूनंतरचे अस्तित्व, या संकल्पनांनाही आपण नाकारत नाही. आयुष्य जगत असताना कधी कधी असे अनुभव येतात की अशा अतिंद्रिय घटनांचाही विचार करावा लागतो. कित्येक वेळा, ही सारी पूर्वजांची पुण्याई असे उद्गारही मुखातून निघतात. याचाच अर्थ कुठल्याशा अदृश्य अस्तित्वाला आपण मनाशी बाळगतो. त्याच्याशी आपण जोडले जातो.

आपले पूर्वज हे आपलं मूळ असतं. (ओरिजिन). शास्त्रीय दृष्टीने सुद्धा त्यांचे जीन्स, क्रोमोझोम्स, पेशी या आपल्या शरीरात जन्मत:च स्थित असतात. आणि याचबरोबर आपल्यातले गुण, स्वभाव, आवडीनिवडी, आपलं कर्तृत्व, आपल्या जगण्याच्या, विचार करण्याच्या दिशा या याच धाग्यांशी निश्चितपणे निगडित असतात. ज्याला आपण जन्मजात गुण असेही म्हणतो.

आपले सण, आपले उत्सव हे ऋतुचक्र आणि शास्त्रीय विचारांवरच आधारलेले आहेत. आणि बहुतांशी ते साजरे करत असताना निसर्गाच्या पंचतत्वांशी कृतज्ञता व्यक्त करणे हेच केंद्रस्थानी असते. पितृपक्ष हा असा पंधरवडा आहे की, तो पाळण्यामागे आज या जगात आपण ज्यांच्यामुळे जन्म घेतला आहे त्यांचे स्मरण आणि कृतज्ञता व्यक्त करणे हेच अपेक्षित आहे. पितृपक्ष मानण्याचा हा एक मुख्य हेतू आहे.

आपण वरचेवर एकमेकांना थँक्यू, सॉरी म्हणतच असतो ना? मग जे आपल्या जीवनात होते आणि आज नाहीत, शिवाय ज्यांना आपण बघितलेही नाही, पण त्यांच्या कथा मौखिक पद्धतीने आपण ऐकत आलो आहोत, त्या सर्व पितरांसाठी अंतःकरणापासून आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे. त्याच वेळी सॉरीही म्हणायचं आहे. कारण अनेक वेळा आपण त्यांना नकळतपणे दुखावलं आहे. त्यांच्या अवमान केलेला आहे. त्यांची आबाळही आपल्या हातून झालेली आहे, म्हणून या अदृश्य आत्म्यांना मनापासून सॉरी म्हणून पुढच्या पिढीलाही संदेश द्यायचा आहे की, बुजुर्गांचा, वाडवडिलांचा ते असतानाच मान ठेवायला हवा. त्यांनी जे कष्ट आपल्यासाठी उपसले आहेत त्याची जाणीव ठेवायला हवी. आमच्या हातून ज्या चुका झाल्या त्या तुमच्या हातून होऊ नये.. असे रचनात्मक संस्कार पुढच्या पिढीवर या पितृपक्षाच्या निमित्ताने करावेत.

दर्भाहुती, तर्पण, अग्नि कुंडातला घास यामागे विकारांचे दहन आणि झालेल्या चुकांसाठी क्षमायाचना हाच उद्देश जाणावा.

भाद्रपद महिना हा पशु पक्षांचा जनन काळ असतो. (ब्रीडिंग सीजन ), कावळ्याच्या विष्ठेतून वड, पिंपळ वृक्षांचे पुन्हा पुन्हा नैसर्गिकरित्या बीजारोपण होत असते. म्हणूनच वृक्षासम सावली देणाऱ्या पूर्वजांना कावळ्याच्या मुखातून घास भरवून निसर्गवर्धनाची भूमिका जाणून घ्यावी.

ही अंधश्रद्धा नसून मनातल्या अबोल भावनांना व्यक्त करण्याचं हे एक साधन आहे. आणि आपलं जीवन सार्थ, सुखी आणि सुरक्षित करणारे एक माध्यम आहे असा सकारात्मक विचार करून पितृपक्षाची ही परंपरा यथाशक्ती राखावी असे मला वाटते.

या काळात शुभकार्य करू नयेत, वाहन खरेदी, वस्त्र खरेदी, गृह खरेदी करू नये, प्रवास करू नयेत या संकल्पनांचा मात्र नक्की पुनर्विचार व्हायला हवा. पितृपक्ष या काळाला अशुभ कशासाठी मानायचे यावर चर्चा व्हावी. या संकेतांना कितपत महत्व द्यावं हे व्यक्तिगत असावं.

आणखी एक विचार मांडावासा वाटतो की, ग्लोबलायझेशन झाले आणि जीवनपद्धतींची देवाणघेवाण झाली. त्यात मदर्स डे, फादर्स डे साजरे होऊ लागले. मग आपली ही पितृपक्ष परंपरा, मातृ-पितृ दिन, फादर्स डे, फोर फादर्स डे म्हणून मानायला काय हरकत आहे? घरातल्या वृद्ध बुजुर्ग मंडळींचा सन्मान त्यांच्या हयातीतच या दिवसात का करू नये? स्वर्गस्थांचे स्मरण आणि हयातांचा सन्मान पितृपक्षात जाणीवपूर्वक व्हावा यात न पटण्यासारखे काय आहे?

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “बहिणाई…” ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? विविधा ?

☆ “बहिणाई…” ☆ श्री सुनील शिरवाडकर

जो असतो परंतु दिसत नाही तो देव..

आणि जे दिसतं परंतु कधीच नसतं ते भेव”

ह्या ओळी लिहिलेल्या आहेत कवयित्री बहिणाई चौधरी यांनी. बहिणाईंच्या कितीतरी गाण्यांमधुन त्यांची देवावरील निस्सीम भक्ती समजते. पण त्यांचा देव केवळ दगडाच्या मुर्तीत नव्हता. त्यांचा देव निसर्गात.. शेतामध्ये.. पिकांमध्ये होता. शेतात आपण लावलेली रोपे हळूहळू मोठी होऊ लागतात.. त्याची पाने वाऱ्यावर डोलू लागतात. आणि बहिणाई बोलू लागतात..

टाया वाजवती पानं

दंग देवाच्या भजनी

…. जमिनीची मशागत करताना त्यांनी उघड्या डोळ्यांनी अनेक क्षण टिपले. त्या पाखरांवर.. जनावरांवर माया करतात. पाऊस म्हणजे तर त्यांचा जीवाभावाचा सोबती.

आला पाऊस पाऊस

शिपडली भुई सारी

धरत्रीचा परीमय 

माझं मन गेलं भरी

 

आला पाऊस पाऊस

आता सरीवर सरी

शेतं शिवारं भिजले

नदी नाले गेले भरी

घरी दारी.. कामात.. विश्रांतीत.. सुखात.. दुःखात त्यांनी जे जे अनुभवले, त्याचे प्रतिबिंब त्यांच्या काव्यात उमटले.

कवियत्री इंदिरा संत म्हणतात..

… बहिणाईंच्या कविता वाचताना पार्श्वसंगीता सारखी माझ्या मनात एक कल्पना नेहमी उभी असते.

आपण झुळझुळ वाहणाऱ्या निर्मळ प्रवाहाच्या काठाशी बसलो आहोत. आणि तळातील रंगीबेरंगी रेती, दगडगोटे आणि प्रवाहाचे तरंग यात अगदी गुंतुन जात आहोत.

… आणि खरंच.. बहिणाईंच्या कविता वाचताना आपण त्यात अगदीच गुंतुन जातो.. गुंगून जातो.

बहिणाईंच्या कविता आपल्याला माहीत असतातच.. पण त्यांच्या नेहमीच्या बोलण्यात देखील उपमा.. अलंकाराची रेलचेल असायची.

… आसु नाही ती सासु कशाची?

आसरा नाही तो सासरा कशाचा?

आता सध्या जे करोनाचे संकट जगावर आले आहे.. तसेच शंभर वर्षांपूर्वी प्लेगचे आले होते. बहिणाईंनी ते दिवस बघितलेले… त्या लिहितात…….

पिलोक पिलोक, आल्या पिलोकाच्या गाठी

उजाडलं गाव, खया-मयामधी भेटी

पिलोक पिलोक, आली नशिबात ताटी

उचललं रोगी

त्यानं गाठली करंटी

करंटी म्हणजे क्वारंटाईन. तेव्हा सरकार शंका आली की उचलून क्वारंटाईन मध्ये टाकत असत. (खरंतर आजही ते तेवढंच गरजेचं आहे).

ध्या करोना मुळे आपण सर्वच जण सक्तीच्या सुटीवर आहोत. आणि म्हणूनच काही जुनी पुस्तके.. काव्यसंग्रह बाहेर निघताहेत. बहिणाईंच्या कविता वाचताना आपण नकळतपणे शंभर वर्षापुर्वीच्या काळात जातो.

माझ्यासमोर जो बहिणाईंचा काव्यसंग्रह आहे.. त्याला प्रस्तावना आहे आचार्य अत्रे यांची. पहिल्या आव्रुत्तीची एक आणि दुसऱ्या आवृत्तीची एक. त्या वाचल्यानंतर बहिणाईंच्या काव्यातील गोडी अधिकच जाणवते.

…. यात कवी सोपानदेव चौधरी यांनी आपल्या आईबद्दल लिहिलेले दोन दीर्घ लेख आहेत

…. कवियत्री इंदिरा संत.. पद्मा लोकुर यांनी बहिणाईंच्या काव्याचे केलेले रसग्रहण आहे.

…. थोर विदुषी प्रा. मालती किर्लोस्कर यांनी लिहीलेला लेख आहे.

बहिणाईंवर लघुपट बनवणारे चित्रपट महर्षी वसंतराव जोगळेकर. त्यांना हा लघुपट बनवताना उमजलेल्या बहिणाई.. त्यांनी एका लेखातून आपल्या समोर उभ्या केल्या आहेत.

आणि या सर्वांपेक्षा जास्त मनाचा ठाव घेते ती एक कविता. बहिणाईंवरच केलेली. त्याचे कवी आहेत.. बा. भ. बोरकर.

त्यांच्याच शब्दात या लेखाचा समारोप करतो. बहिणाई चौधरींना ते म्हणतात..

देव तुझ्या ओटीपोटी

देव तुझ्या कंठी ओटी!

 

दशांगुळे उरलेला

देव तुझ्या दाही बोटी!

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares