मराठी साहित्य – विविधा ☆ वर्क फ्रॉम होम ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

☆ विविधा ☆  वर्क फ्रॉम होम ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆

वर्क फ्रॉम होम, ही कनसेप्ट आता साऱ्या जगभर दुमदुमते आहे. या बाबतीत कुणाला काही माहिती नाही असे नाही किंबहुना त्याचे महत्व ही आता सगळ्यांना पटायला लागले आहे. अर्थात हे काम इंजिनियर्स, टिचर्स. ऑफीस  वर्कर्स यांच्याच साठी अॅप्लिकेबल आहे असेच मानले जाते.

पण खरं सांगू का? शतको न शतके आपल्या संर्वांच्या घरातील महिला, गृहिणी वर्क फ्रॉम होम करतच आल्या आहेत. पण त्यांच्या कामाची, कष्टाची कोणीही दखल घेतली नाही. अन् घेतली जाणार ही नाही. घरीच असते म्हणजे घरातील कामे तिचीच असेच गृहीत धरले जाते. ती कामे करताना ती किती दमून जाते याचा कोणी विचारच करत नाही. ऑफीसचे काम घरामधून केले की निदान त्याचा रिटर्न पगाराच्या रुपामध्ये मिळतो. बँक बॅलेन्स वाढत जातो. एक प्रकारे मानसिक शांतता ‘ ऊ ब, समाधान नकीच मिळते. मात्र गृहिणी ना तेवढा आधारही नाही. पगार वाढ करा म्हणून संप करू शकत नाहीत की हौसेनं एखादी वस्तू मनात आले म्हणून घेऊ शकत नाही.

काही वर्षापूर्वी मलेशियाला जाण्याचा, तिथे रहाण्याचा मला योग आला होता. तेव्हा तिथल्या मित्रांना यांनी घरी जेवायला बोलावले होते. आपल्या पद्धती प्रमाणे मी जेवण वाढत होते. साधे मीठ वाढले, भांड्यात प्यायला पाणी घातले तरी ते प्रत्येक वेळी ‘ थँक्यू ‘ म्हणत होते. पहिल्यांदा ते थँक्यू ऐकून माझे मन भरून आले. डोळ्यात पाणी जमायचेच बाकी राहिले होते. मला आपल्या सगळ्यांच्या घरातल्या आई, आजी काकू, मावशी, आत्या सगळ्या सगळ्या आठवल्या. आयुष्यभर संसाराचा रामरगाडा ओढला तरी एकदाही तिला ऐकायला मिळाला नसेल ‘ धन्यवाद’ शब्द !

अर्थात आपल्या कडे तशी अपेक्षा नाही आणि प्रथा तर नाहीच नाही. पण घरातल्या कोणीतरी मनापासून दखल जरी घेतली तरी तिला आणखीनच काय करण्याचा उत्साह येतो. पण गृहीत धरणे हे आपल्या कडे रुटीन असल्यामुळे तिकडे कोणाचे लक्ष्य जात नाही.

असे दुर्लक्ष्य फक्त महिलांचे होते असेही नाही. पूर्वी एकत्र कुटुंब काळामध्ये मोठ्या व्यक्तिचा घरावर दरारा असायचा, दबदबा असायचा. त्याचाच लहान भाऊ किती जरी कर्तबगार असला, तरी त्याचे एका शब्दानेही कौतुक होत नसे. त्याची दखलही घेतली जायची नाही. हे कुणाच्या लक्षातही यायचे नाही.

आजच्या वर्क फ्रॉम होम मुळे निदान सर्वांना गृहिणीचे अस्तित्व, कर्तृत्व अन् महत्व समजायला लागले आहे असे आपण आनंदाने मानूया.

© सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आयुर्वेद कोश – फोडणी ! ☆ वैद्य.अंकुर रविकांत देशपांडे

 ☆  विविधा ☆ आयुर्वेद कोश – फोडणी ! ☆ वैद्य.अंकुर रविकांत देशपांडे ☆ 

फोडणी वरती कधी लेख लिहावा लागेल असे वाटले नव्हते.. चार दिवसांपूर्वी शेवटची अपॉइंटमेंट आणि गप्पिष्ट रुग्ण असा योग जुळून आल्याने ‘खाण्यावर’ गप्पा रंगल्या होत्या. लॉकडाउन मधे अनेक निरनिराळे ‘ट्रेंड’ आले. लोकांनी फावल्या वेळात अनेक पदार्थ करून पाहिले. विविध पदार्थानी सोशल मीडिया सजला. आपण घरी जिलेबी, खारी, ब्रेड, पफ-पेटीस असे पदार्थ करू शकतो असा आत्मविश्वास अनेकांना आला. सर्वांच्या कष्टाचे आणि हौसेचे अभिनंदन! रोजच्या स्वयंपाकाचा अविभाज्य भाग फोडणी हे शास्त्र आणि कला मात्र अस्तंगत होत आहे असे सामान्य निरीक्षण आहे ! त्यावर थोडे मत प्रदर्शन.. चुकून कोणाला ठसका लागला कोणाला उचकी लागली तर जमल्यास मला माफ करावे!

हिंदुस्तानची ओळख ‘मसाल्यांचा’ देश अशी होती. आजही आहे. दक्षिणेत मसाल्याचे पदार्थ फार उत्तम पद्धतीने वापरतात. ठराविक प्रमाणात वापरतात. आपल्याकडे आताच्या पिढीला मसाल्याचे पदार्थ एकतर सगळे ठाऊक नसतात. असले तर ते कोठे, का आणि कसे वापरायचे याची माहिती नसते. खरं सांगू.. आजीबाईच्या बटव्यात कधी त्रिभुवनकीर्ती, सूतशेखर, सितोपलादी, चंद्रप्रभा नव्हतेच. तिला यांची कधी गरजच लागली नाही. जिरे, मिरे, हिंग, ओवा, ओव्याची पानं, लवंग, दालचिनी, तमालपत्र, जिरे, शहाजिरे, वेलदोडा, मोठा वेलदोडा -मसाला वेलदोडा, जायफळ, धने, जावित्री, कसुरी मेथी, सुके खोबरे, मेथी, आमचूर, बडीशेप, मोहरी, काकडी बी, भोपळा बी, आवळकाठी, लसूण, चिंच, कोकम, खसखस, सैंधव, शेंदेलोण, पादेलोण, काबाबचिनी, केशर, सुंठ, चक्र फुल, हळद, तीळ, डिंक, खडीसाखर हा आजीबाईचा बटवा आहे. आपण आपल्या सोयीसाठी त्यात औषधी कल्प घातले आणि आजीबाईच्या नावाअडून ‘बिन डिग्री फुल अधिकरी’ हातचलाख्या सुरु केल्या. असो !

आजीबाईचा बटवा आणि त्यातील शास्त्र स्वयंपाकघरात खुलतो. आम्ही अन्न हे “महा भेषज” – सर्वोत्तम औषध असे म्हणतो त्याचे मूळ फोडणीत असते. टोमॅटो प्युरी मधे नाही ! सध्या सगळेच पदार्थ टोमॅटो प्युरी मधे करायची घाणेरडी सवय रुळली आहे. हॉटेल असो किंवा घर अशा प्युरी चे डबे फ्रिज मधे तयार असतात. टोमॅटो प्युरी भाजीचा ‘बेस’ असो म्हणे ‘बेस’! अतिशय अयोग्य आणि अशास्त्रीय पद्धतीने आपल्या आरोग्याचा बेस बिघडवला आहे हे नक्की! टोमॅटो हिंदुस्तानात पोर्तुगीजांनी आणला १६ व्या शतकात. त्याच्या आधी अत्यंत चविष्ट, शास्त्रीय हिंदुस्थानी खाद्याचा ‘बेस’ काय होता ?? आजकाल कांदे पोहे मसाला पासून मिसळ मसाला याची पाकिटं मिळतात. पाकीट फोडले की विषय संपला. इन्स्टंट पदार्थ तयार… ज्या घरात फोडणी व्यवस्थित होते ते घर निरोगी आणि घरातील व्यक्ती नशीबवान !

तेल गरम झाल्यावर त्यात आधी कमी प्रमाण असलेले जिन्नस, त्यांचा अर्क तेलात उतरला की पुढील पदार्थ सर्वात शेवटी भाजी असा सामान्य क्रम आहे. स्वयंपाकाचा हात उत्तम असला की पळीभर तेलात टाकलेले चिमूटभर हिंग सुद्धा जळत नाही. आपली सवय अशी.. तेल गरम करायचे, कांदा टोमॅटो मिरची कढईत टाकायची वरून मसाला भुरभुरायचा किंवा मसाला फक्त दोन तीनदा झाऱ्याने हलवून त्यात भाजी घालायची. सोपे उदाहरण देतो.. महाराष्ट्राचे राष्ट्रीय खाद्य कांदे पोहे आपण सगळेच खातो. त्यात खुसखुशीत कढीपत्ता कोणाला कधी सापडला आहे का? दही पोहे यावर काही लोक फोडणी घालतात त्यात भरलेली मिरची घालतात.. मिरचीचे आतील सारण किती वेळा खुसखुशीत फ्राय झालेले असते? एखाद्या म्हणजे एखाद्या तरी भाजीला ”अहाहा.. जिऱ्याचा काय सुंदर वास लागलाय?’ असे होते का? हॉटेल मधे ३०० रुपयाला वाटीभर मिळणाऱ्या जिरा राईस मधे जिरा चा आस्वाद कितीसा असतो ? हे सांगायचे कारण असे.. खाद्य हे पौष्टिक होण्या पेक्षा प्रेझेंटेबल होण्याकडे कल बराच वाढला आहे.. तेलात/तुपात भाजलेला हिंग-लसूण पोटात जात नाही. ओवा लवंग तिखट लागतो म्हणून आपण वापरत नाही. कढीपत्ता बोअर असतो म्हणून पानाच्या साईड ला काढून ठेवतो. त्यामुळे पोटात अन्न भरपूर जाते शास्त्र मात्र जात नाही!

पचन संस्थेचे वाढत चालणारे आजार आणि उठसुठ होणाऱ्या एन्डोस्कोपी-कोलोनोस्कोपी याचे कारण अशास्त्रीय पद्धतीने बनवलेला – खाल्लेला आहार आहे. फोडणीत भाजलेला लसूण चावून खाणे किंवा बटाटा भाजी सारख्या पचायला जड असलेल्या भाजीच्या फोडणीत ओवा जिरे असणे हा आजीबाईचा वारसा आहे. पोट टम्म झाल्यावर इनो पिऊन बुलबुले काढणे हा ग्रॅनी चा वारसा आहे. अधोरेखित करायचा मुद्दा असा, मिरच्यांच्या धुरी आणि लालेलाल स्वयंपाक मौज म्हणून करायला हरकत नाही. फोडणी मात्र बायपास व्हायला नको… चिंच कधी आणि आमसूल कधी हे गृहिणीला बरोबर माहित असते. त्याच घरात आरोग्य असते.. कामाच्या व्यापामुळे अनेकांकडे स्वयंपाकाला बाई असते. हरकत नाही.. ऑफिस मधे जसे आपण प्रोजेकट डिझाईन करतो तसे आपला स्वयंपाक डिझाईन करून द्यायला काहीच हरकत नाही!

कोणत्याच तयार मसाल्यात काहीच ‘मॅजिक’ नसते. मॅजिक असते ते करणाऱ्याच्या हातात. केलेल्या फोडणीत.फोडणीत आपले सत्व सोडणाऱ्या मसाल्यात. केलेले अन्न आनंदाने खाणाऱ्या व्यक्तीत. वैद्य असो किंवा अन्नपूर्णा ”योजक: तत्र दुर्लभ:” हा सिद्धांत दोघांनाही लागू होतो !

 

© वैद्य.अंकुर रविकांत देशपांडे

एम डी (आयुर्वेद )

आरोग्य मंदीर, सांगली -पुणे -कणकवली

7276338585

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ती नसताना ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी

☆ विविधा ☆ ती नसताना ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆ 

‘ ती नसताना ‘

मी नसताना …. कल्पनेने…..मी पुरुषी कल्पनेतून पतीचे  पत्नीबद्दल विचार मांडण्याचा प्रयत्न केलाय…..

तिच्या श्वासतील ऊबेने मी रोमांचित होत असताना, मला अचानक जाग आली….आणि बघतो तर ‘ती’ नव्हती जवळ…ती ४ दिवसांसाठी ट्रीपला गेली होती.  मी विचार करू लागलो की……किती सुखद भास होता तो! मग मी उठून सगळ्या खोल्यात फीरलो…ती नाहीए कुठेही हे माहित असतानाही…मी सर्व खोल्यात गेलो…कारण मला अनुभवायचं होत ती! त्या त्या खोलीत असतानाची… कल्पनेतील तीच वास्तव्य, विचार करता जाणवलं की आभासी असलं तरीही सुखावणार होत! कारण गेल्या अनेक वर्षात ती असताना मी ते अनुभवलं होत.

देवघरात देवाची पूजा करताना….त्या देवांची ठराविक जागा,तिचे अथर्वशीर्ष,श्रीसुक्त म्हणणे, फुल घालताना ती सर्व देवांशी त्यांची नाव घेऊन बोलते!ते तिलाच जमत, आणि तिला जे जमत ते मला आवडत!?

आम्ही दोन दिवसात ओट्यावर खूपच पसारा करून ठेवलाय…पण पसारा किती केलाय म्हणून आता ओरडायला ती नाहीए…नेहमी नाही पण, तीही पसारा करते कधीतरी…पण ते आवरण्याचं चातुर्य, time मॅनेजमेंट,चटपटीतपणा तिलाच जमत सगळं…कारण ह्या आम्ही केलेल्या पसाऱ्यात मला तर आवरायला नक्की कुठून सुरुवात करावी हेच कळत नाहिए. ?

फ्रिज मध्ये दूध आणि ताकाच पातेलं बघून खूप गोंधळ झाला, वास व चव घेऊन बघता ताक व दुध कोणत.. हे लक्षत आलं.किती साधी सोपी गोष्ट, पण ती करते सगळं म्हणून कधी फार लक्ष दिल गेलं नव्हतं.

तिच्या कवितेच्या डायरीची एक एक पान उलटली… आणि तीची कवितेची साहित्याची ओढ आणि तिचे विविध विषयांवरील लेख कविता किती सध्या भाषेतील पण प्रगल्भ विचार आहेत हे लक्ष्यात आलं. कवितेतील जास्त काही मला कळत नाही पण त्यात माझ्यावरील काही कविता होत्या…मी त्या जोरात म्हणू लागलो आणि जणू तीच त्या कविता म्हणत आहे असा भास मला होत होता…. तीच ते कवितांचं सादरीकरण… त्यात माझयाबद्दलची रोमँटिक कविता… त्यात हळूच तीचं माझ्याकडे चोरून बघणं… लाजण…. मी सगळं जणू कल्पनेनेच पण  खरंखुरं अनुभवत होतो!

मुलांच्या कपड्याच कपाट उघडून मी आत बघणार तोवर सगळे कपडे धाडकन अंगावर पडले..मग परत आठवली ती, तीव्रतेने….मुलांचे कपडे धुवून कसे नीटनेटके ठेवते..आता तर ह्या कपड्यात धुतलेले कळेना, न धुतलेले कळेना.

कधीकधी वाटायचं …काय करते ही? घरी असते,पण हिला कुठं काय इतकं काम असत?

पण साखर सम्पली तेव्हा गुळ घालून चहा केला… तेव्हा आठवली ती! Emergency बटाट्याच्या काचऱ्या कशा करायच्या हे तिने शिकवलेलं होत ते करताना आठवली ती! भाताचा अंदाज किती वेळा सांगितला होता तिने, पण कधी प्रयत्नच नाही केला…शिकलो असतो तर आलं असतआज,असा विचार करताना आठवली ती! पोळ्या तर विकतच आणल्या आम्ही…पण तीचं  पोळी लाटतानाच दृश्य समोर आलं, खरच ती किती गोल व लुसलुशीत पोळ्या करते हे बाहेरच्या पोळ्या तोडताना जाणवलं, तीच घरासाठी करणं हे मनापासून  असत आणि त्यात तिचा जीव असतो. ती अनेकदा काही स्तोत्र म्हणत स्वयंपाक करते, त्यावर तीच वाक्य मला नेहमी च पटत की त्या स्तोत्रामधून  positive vibration अन्नात उतरतात, आणि ते शरीर व मनासाठी खूप पोषक व सकारात्मक असतात, हितकारक असतात.

बारीक बारीक गोष्टीत मला आठवत आहे ती!  आठवते म्हणण्यापेक्षा उणीव भासते अस म्हणावं लागेल.

हे, कुलदेवता, वास्तुदेवता तुझ्या आशीर्वादाने  ह्या वास्तूतील वस्तू आम्ही घेतल्या, ज्या भौतिक रूपाने मला फक्त माहिती आहेत. पण ‘ती’चा प्रत्येक वस्तू मध्ये प्राण आहे,आत्मा आहे . त्या सर्वानाही आमच्यापेक्षा तीच जास्त हवी असते अस जाणवलं.

ती नसतानाची वास्तूही, ‘ती’ च्या केवळ विचारांनी, कल्पनेने आनंद देते, सकारात्मक ऊर्जा देते, मला, मुलांना, आमच्या गॅलरी मधील झाडांनाही…मग ती असतानाची वास्तू व प्रसन्नता, ती असतानाचे नंदनवन काय वर्णू?

बोलताना आणि जगताना…बाला, प्रेमला आणि वत्सला अशा विविध रूपातील ती, खूप साधी….

येताजाता तिच्या बांगडयांच्यां मंजूळ नादाने, पावलांच्या लगबगिने, कधी गोड प्रेमळ बोलण्यातून,तर कधी स्पष्टवक्ते पणाने, आपले विचार मांडणारी…

‘ती’… माझी अर्धांगिनी?

ती नसतानाही…ती स्पर्शली!!!!?

 

© सौ अश्विनी कुलकर्णी

सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दगड आणि माती ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

☆ विविधा ☆ दगड आणि माती ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

माती किती शहाणी असते ना? तशी ती दगडापासून बनते.  पण मातीजवळ सृजनाची एक वेगळीच ताकद आहे. दगडाचा कठीणपणा मातीला नाही. तिच्या जवळ दगडात असलेलीच मूलद्रव्य आहेत. पाणी शोषून घेण्याची क्षमता मात्र फक्त मातीकडं! दगड थोडेसे ही पाणी शोषून घेऊ शकत नाही. पाणी शोषून घेऊन मातीचा मात्र चिखल होतो. वरवर जो चिखल वाटतो, तो सहजपणे कशालाही चिकटतो. असं लाघव दगडाजवळ नाही. ऊन्हानं, पावसानं दगड झिजतो, तडकतो पण याच ऊन-पावसानं माती सुगंधीत होते. सगळ्या विश्वाला आधार देण्यासाठी सज्ज होते. तिच्या रंध्रारंध्रातून जीवन अंकुरते. तिच्या गात्रागात्रातून इवलाली हिरवी पानं टाळ्या वाजवू लागतात. हिरवळीचा गारवा सगळ्या सजीव सृष्टीला थंडावा देतो. छोटे छोटे जीव जिवाणू तिच्या कुशीत वाढू लागतात. आधार शोधतात. आनंदानं, ऊत्साहानं जीवन जगतात. शेवटी धावून धावून थकतात तेंव्हा तीच हात पसरून सगळ्यांना सहजपणानं सामावून घेते. मातीतच मिसळल्याशिवाय, एकरुप झाल्याशिवाय शांती नाही. माती लागू नये म्हणून आयुष्यभर जपलं तरी मातीतच माती होऊन मिसळण्याची आस शेवटी लागतेच. ही आस तरी कशासाठी? नव्यानं अंकुरण्यासाठी!, पुनःश्च पालवण्यासाठी!!

कवयित्री  इंदिरा संत म्हणतात,

रक्तामध्ये ओढ मातीची

मनास मातीचे ताजेपण

मातीतून मी आले वरती

मातीचे मज अधुरे जीवन

केशवकुमार मात्र ‘होता डोंगर माथ्यावर पडला धोंडा भला थोरला’ …. असं म्हणत दगडातही काव्य शोधतात. खरंतर दगड केव्हढा सामर्थ्यवान! किती कठीण! म्हणूनच तो भक्कम इमारतींच्या बांधकामासाठी वापरण्यात येतो. कित्येक मजली उंच टोलेजंग देखण्या वास्तूंचा पाया बळकट करतो. तरीही नुसता दगड इमारत बनवू शकत नाही. दोन दगड सांधायला चिकट मातीच लागते.

काही दगड सागरगोटे बनून अल्लड सान हातात खेळत राहतात. गोफणीतून भिरकावलेला दगड शेतातील पिकांचे रक्षण करतो. तर लगोरीचा दगड ववात्रटपणाचा शिक्का घेऊन कैऱ्या, चिंचा पाडतो.

दगडाला टाकीचे घाव घातले की तो देव बनतो. गाभाऱ्यात सजवला जातो. पूजला जातो.

पायरी ओळखून पायरीशीच थांबणारे काही

असले तरी, देवाआधी त्यांनाच पहिला नमस्कार मिळतो. काही दगड कळसावर सुवर्ण कलश घेऊन सजतात.

हाच दगड कोरीव नक्षीकामानं सजवला की, महालांची, राजवाड्यांची शोभा वाढवणारा खांब बनतो. एखादा कुशल कारागीर त्यातून सारेगमचे सप्तसूर उमटवतो. कोरीव शिल्पकाम करून कुणी शिलाकार त्या दगडाला इतिहासाच्या कागदावर कायमस्वरूपी कोरुन ठेवतो.काही दगडांना पाटीचा, सरस्वती पूजनाचा मान मिळतो. काही दगडांना शीलालेखानी अजरामर केले. पाऊस, पाणी, ऊन, वारा यांना वर्षानुवर्षे तोंड देत तो इतिहासाचा साक्षीदार बनतो अनेक पिढ्यांना शौर्य, शृंगार, धैर्य, देशप्रेमाच्या रसात चिंब करतो. संगमरवरी असेल तर ताजमहाल बनून प्रेमकहाणी सांगतो….. तरीही.. तरीही… जीवनचक्र सुरू ठेवण्यासाठी मातीलाच नतमस्तक होतो.

 

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

मो.नं. ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भूक ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते

☆ विविधा ☆ भूक ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते ☆

माणूस आपल्या गरजा भागवण्यासाठी पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे.कारण तो परावलंबी आहे. आपल्या गरजा भागविण्यासाठी बुध्दिचा वापर करून तो कोणत्या ही थराला जावू शकतो.तो स्वार्थी आहे. गरजे पेक्षा जास्त घेण्याची आणि साठवण्याची त्याला सवय लागली आहे.ही सवय निसर्गातील कोणत्यांच सजीवात दिसत नाही. खरं तर वनस्पती सोडल्या तर कोणच स्वत:चे अन्न स्वत:करू शकत नाही.निसर्गात प्रत्येकाच्या अन्नाची सोय आहे.”जीवो जीवस्य जीवनम्”या साखळीत सजीव जगत आहे.आपले अन्न तो शोधतो मिळवण्याचा प्रयत्न करतो.याचा प्रत्यय निसर्गात पावलो पावली दिसतो.

पाखरांच्या किलकिलाटाने मी बाहेर आले.रस्त्यावर चिमण्या आनंदाने दाणे टिपत होत्या, उडत होत्या.इकडून तिकडे जात होत्या. त्या स्वछंदी होत्या.हलचाली मोहक होत्या.सकाळी सकाळी तो चिवचिवाट प्रसन्न वाटत होता.आपल्या नादात होत्या. एवढ्यात… गल्लीतली दोन तीन कुत्री तिथे आली.चिमण्यांना बघून ती हरकून गेली.त्यांच्या जिभेला पाणी सुटले.आज आपली चांगली मेजवानी होणार, या आविर्भावात ते होते. दबा धरून राहीले. हळूहळू पुढे झाले. आता ते चिमण्यावर  झडप घालणार..त्या बळी पडणार. असे मला वाटले,. त्यांना मी हाताने  उसकवणार… तेवढ्यात सगळ्या चिमण्या भूर्र…कन्…उडाल्या. कुत्री… भुंकली चरफडली.मागे फिरली.चला चिमण्या वाचल्या… म्हणून मी खुश झाले, मागे फिरले ,तो पुन्हा चिमण्यांचा थवा दाणे टिपायला  आला.चिमण्यांची चाहूल लागताच कुत्र्यांची झुंड पुन्हा मागे फिरली. पुन्हा आशा पालवल्या.पुन्हा दबा धरून राहिले. चिमण्या वर  झडप टाकणार… तेवढ्यात चिमण्या उडाल्या.आता मात्र कुत्रे मुक झाले.त्याच्या डोळ्यात आता भूक  दिसू लागली.मला त्याची कीव आली.मी पडले शाकाहारी. घरातल्या पावाचे तुकडे कुत्र्यांना टाकले.चिमण्याना  दाणे टाकले.

दोघे ही भूक भागवण्याचा आपला मार्ग सोडत नव्हते.रोजच हे हेच दृश्य बघत होते.

निसर्गत: आपलं रक्षण करण्याचे ,भूक भागवण्याचे सामर्थ्य सर्वाना बहाल केले आहे.तरी मझ्या मनात आले या कुत्र्यांना माणसांसारखी  बुध्दी असती तर….भूक भागविण्यासाठी, त्यांनी या चिमण्यांनसाठी जाळे टाकले असते.त्यात दाणे पेरले असते.अगतिक चिमण्या फसल्या असत्या,तडफडल्या असत्या.कुत्र्याची भूक भागली असती.पण एवढी बुध्दी निसर्गाने कुत्र्याला दिली नाही,हे बरेच झाले, नाही का?

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

मो.९६५७४९०८९२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मन ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी 

☆ विविधा ☆ मन ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆ 

मन उधाण वा-याचे गूज पावसाचे

शंकर महादेवनच्या ह्या गाण्याचे सूर कानावर पडले. किती छान गाणं, आवाज,  आशय. आणि विचार आला,  मन किती छोटा, सरळ शब्द. ज्याला काना, मात्रा, वेलांटी, उकार, नाही. पण त्यात किती काहीही सामावण्याची शक्ती आहे.

खरंच त्याचा वेग किती आहे?क्षणात इकडे तर क्षणात आणि कुठे भरकटेल त्याचा नेम नाही. त्याला कुठलेच बंधन नाही. थोडाफार  आपण लगाम घातला तरच.

बहिणाबाईच्या भाषेत सांगायचे तर आता होते भुईवर गेलं गेलं आभाळात.  त्या मनाला फिरायला त्रिखंड पण कमीच.

त्याला फिरायला स्थळ, काळ, वेळ कसलं बंधन नसतं.  कघी ते बालपणीच्या रम्य आठवणीत रमतं तर कधी ते तारुण्यातील स्वप्न पाहतं. सासुरवाशीण कधी मनाने माहेरी आईच्या कुशीत शिरेल. तर एखादी माऊली परदेशी असलेल्या आपल्या वासराकडे मनानेच फेरफटका मारून  येईल.   5, 6वर्षाच्या मुलाला बॅट कशी धरायची ते शिकवताना  एखादा बाबा आपला मुलगा सचिन झाल्याचे मनात चित्र रंगवेल. मनाच्या भरा-या मोठ्या असतात. जिवाला थोड्या वेळासाठी का होईना सुखावणा-या असतात.

मनांत  काय सामावत नाही? राग लोभ प्रेम,  इर्षा, द्वेष. सकारात्मक,  नकारात्मक विचार.  आणि एकदा का ह्या मधला कोणत्याही प्रकारचा विचार आला की मग ते त्याच्या पाठपुरावा करतच. अशावेळीच त्याला लगाम घालण्याची आवश्यकता असते.

मन असले तरी ते इतर अवयवां सारखे दिसत नाही. पण खूप नाजूक असते. म्हणून जपावे लागते. आपले आणि समोरच्या व्यक्तीचे. एकदा का ते दुखावले गेले तर कितीही फुंकर मारली तरी सुखावणं कठीण असतं म्हणून शब्द आणि कृती जपून विचारपूर्वक करावी. जो समोरच्याच मन जपतो, जिंकतो तो खरा माणूस.

आपलं स्वतःचे मन पण आपल्या शरीरासारखंच जपायचं असतं त्याच्याकडे दुर्लक्ष करुन चालत नाही. ‘ मी शरीर कमावलं, मेनटेन केलं’ तसच मानसिक संतुलन सांभाळणे तितकेच महत्त्वाचे आहे. बाहेरुन छान मेकअप केला आणिचेहरा ओढून ताणून हसरा ठेवला, पण मन दुःखी असले तर तो आनंद तात्पुरता. जीवनातील आनंद हा मनस्थितीत अवलंबून असतो. त्यात जास्त नकारात्मक भावनांना थारा द्यायचा नसतो. त्या साठवणं तर दूरच. मनाची पाटी ताबडतोब पुसून टाकायची.  नाहीतर मानसिक,  शारीरिक दोन्ही त्रास होतात.  आपल्याला,  स्वतःला आणि आजूबाजूच्या लोकांना.  परिणामी वातावरण बिघडवून सगळ्यांनाच त्याचा त्रास होतो. आठवणी पण चांगल्या गोष्टीच्या ठेवायच्या.

या मनांत एखादा काळजीचा, चिंतेचा किडा शिरला कि मग संपलचं. तो मन आणि त्याच्या बरोबर शरीर पण पोखरुन कमकुवत करतो. येणा-या प्रत्यक्ष संकटापेक्षा मन कल्पनेनेच भयानक चित्र रेखाटत आणि त्या विचाराच्या डोहात खोल खोल जाते. आणि त्रास करुन घेते. त्याला वेळीच लगाम घातला पाहिजे.

हे मन कधी, कुठे, कोणात, केवढे गुंतवायचे त्यावर प्रत्येकानी नियंत्रण ठेवायला पाहिजे.  आपण आपल्या मुलांमध्ये गुंततो.  कधीकधी जरुरीपेक्षा जास्त.  मग त्यांच्याकडून अपेक्षा पण जास्त ठेवतो. त्याचा त्यांना पण त्रास होतो आणि अपेक्षा पूर्ण नाही झाल्या कि आपल्या मनाला त्रास होतो. आपण मनाने  एखाद्याला आपले मानण्याआधीच त्याला पारखून घ्यायचे. नाहीतर त्याच्याकडून पण आपल्या भावनिक अपेक्षा पूर्ण न झाल्याने मानसिक त्रास होतो.

त्या मनाला कसे, कुठे, किती वळवायचे

काय मनांत ठेवायचे, काय सोडून द्यायचे

ह्याची सुंदर योग्य ती शिकवण आपल्याला समर्थानी मनाचे श्लोकाद्वारे दिली आहे.

आपण मनांने खूप स्वप्न रंगवतो ती योग्य वेळीच पूर्ण होतात. आंणि जर नाही झाली तर सोडून द्यायची असतात. ती नाही झाली  कारण ती न होण्यातच आपलं हित आहे असा सकारात्मक विचार करायचा.

सुखी समाधानी आयुष्याची गुरुकिल्ली

ठेविले अनंते तैसेची रहावे

चित्ती असावे समाधान!

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मिरजेतील एकमुखी दत्तमूर्तींची ऐतिहासिक परंपरा ☆ श्री मानसिंगराव कुमठेकर

श्री मानसिंगराव कुमठेकर

☆ विविधा ☆ मिरजेतील एकमुखी दत्तमूर्तींची ऐतिहासिक परंपरा ☆ श्री मानसिंगराव कुमठेकर ☆ 

मिरज आणि म्हैसाळमध्ये एकमुखी दत्तमूर्ती

निरंजन रघुनाथांनी सुरू केली परंपरा

मिरज तालुक्यात एकमुखी दत्तमूर्ती असलेली तीन ऐतिहासिक मंदिरे आहे. उत्तर पेशवाईत मिरजेत आलेल्या निरंजन रघुनाथ या थोर दत्तभक्तांनी मिरज किल्ल्यातील माधवजी मंदिरात एकमुखी दत्तांची मूर्ती स्थापना केली. त्यानंतर म्हैसाळ आणि मिरजेत अशाच पध्दतीच्या हुबेहुब मूर्ती अन्य दत्तभक्तांनी स्थापन केल्या. एकमुखी दत्तांच्या या मूर्ती दुर्मिळ असून, वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मिरज आणि म्हैसाळ येथील एकमुखी दत्तमंदिरात दर्शनासाठी दूरवरून भाविक येतात.

पेशवाईच्या उत्तर काळात निरंजन रघुनाथ नावाचे थोर दत्तभक्त होऊन गेले. त्यांनी गिरनार पर्वतावर कठोर तपश्चर्या केल्यानंतर साक्षात दत्तात्रयांनी त्यांना दर्शन दिले, असे सांगण्यात येते. हे दर्शन सहा हस्त आणि एकमुख अशा स्वरूपाचे होते. निरंजन रघुनाथांनी दत्तभक्तीपर काही ग्रंथ आणि काव्यात्मक रचना केल्या. पुढे रघुनाथ निरंजन हे मिरजेत आले. त्यावेळचे मिरज संस्थानचे अधिपती श्रीमंत गंगाधरराव बाळासाहेब पटवर्धन (दुसरे) यांनी त्यांना आश्रय दिला. निरंजन रघुनाथांनी मिरजेत मठ स्थापना केली. सध्याच्या अंबाबाई तालीमसमोर शिराळकर (बेकरीवाले) यांच्या वाडय़ात आजही हा मठ आहे.

निरंजन रघुनाथांचा अनुग्रह श्रीमंत बाळासाहेबांनी घेतला होता. त्यामुळे त्यांनी सन 1853-54 मिरजेच्या भुईकोट किल्ल्यात असणाऱ्या माधवजी मंदिरात दत्त मंदिर बांधले. या मंदिरात निरंजन रघुनाथांच्या हस्ते काळ्या पाषाणातील एकमुखी दत्तांची सुंदर अशी मूर्ती स्थापन करण्यात आली. ही मूर्ती त्याकाळी मिरजेच्या पंचक्रोशीत प्रसिध्द होती. निरंजनबावांनी सन 1855 मध्ये मिरजेत कृष्णानदीत जलसमाधी घेतली. त्यांचे पुत्र योगीराजबावा यांना श्रीमंत बाळासाहेबांनी जमिन इनाम दिल्या होत्या. मिरज किल्ल्यातील या दत्तमंदिर स्थापनेसंदर्भातील आणि निरंजनबावांच्या मुलांना दिलेल्या इनामाबाबतची कागदपत्रे मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहात आहेत.

निरंजबावांच्या हस्ते स्थापन झालेली किल्ल्यातील दत्तमूर्ती पाहून तत्कालीन अन्य दत्तभक्तांनीही त्याच कारागिराकडून हुबेहुब अशा मूर्ती तयार करवून घेतल्या. या तीनही दत्तमूर्तींना एक मुख असून, सहा हात आहेत. या सहाही हातांपैकी दोन हातात विष्णूंची शंख आणि चक्र ही आयुधे, शिवाची डमरू आणि त्रिशुल ही आयुधे आणि ब्रम्हाचे कमंडलू आणि माळ अशी रचना आहे. पायात खडावा आहेत. मूर्तीभोवती कोरीव नक्षीकाम असलेली सुंदर प्रभावळ असून, त्यावर मध्यभागी कीर्तिमूख आहे.

मिरजेतील भुईकोट किल्ल्याच्या बाहेर उत्तर बाजूला असणाऱया मोकळ्या मैदानात दत्तभक्त असणाऱ्या वेदमूर्ती सीतारामभट आपटे यांनी 1881 सालच्या माघ शुध्द पंचमीला एकमुखी दत्त मूर्तीची स्थापना केली. किल्ल्याच्या मैदानातील मंदिर म्हणून त्याला ‘मैदान दत्त मंदिर’ या नावाने ओळखले जाऊ लागले.

याच काळात मिरजेजवळच असणाऱ्या म्हैसाळ गावातील देवल नामक दत्तभक्ताने आपल्या घरालगत एकमुखी दत्तमूर्तीचे मंदिर बांधले. त्यामुळे मिरज तालुक्यात 19 व्या शतकात एकसारख्या दिसणाऱ्या तीन एकमूखी दत्तमूर्ती होत्या. त्यांचे दर्शन घेण्यासाठी दूरवरून भाविक येत. सन 1948 साली मिरज संस्थान हे स्वतंत्र भारतात विलीन झाले. त्यानंतर मिरज किल्ल्यातील माधवजी मंदिराच्या आवारात असणाऱ्या दत्तमंदिरातील एकमुखी मूर्ती स्थलांतरीत करण्यात आली. सध्या मैदान दत्त मंदिर आणि म्हैसाळ येथील दत्त मंदिरात या मूर्ती पहावयास मिळतात.

एकमुखी दत्तमूर्ती या महाराष्ट्रात मोजक्याच ठिकाणी पहावयास मिळतात. मैदान दत्त मंदिरात नैमित्तिक कार्यक्रमांबरोबर कार्तिक महिन्यात होणारा दीपोत्सव प्रेक्षणीय असतो. दत्तजयंतीचा कार्यक्रम मोठया प्रमाणात साजरा होतो. पूर्वी येथे राज्यातील नामांकित कीर्तनकार, प्रवचनकारांची प्रवचने होत असत. या मंदिराचे शतकमहोत्सव आणि शतकोत्तर रौप्य महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात आले होते.

 

© श्री मानसिंगराव कुमठेकर

मिरज

मोबाईल क्रमांक ९४०५०६६०६५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अपार.. अपरंपार… ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ अपार.. अपरंपार… ☆ श्री अरविंद लिमये ☆

क्षण क्षणकाळासाठी येतो. क्षणात विरुनही जातो. सर्वसामान्य माणसं येईल, होईल ते स्विकारत जगत असतात. कालपटलावर अशा सर्वसामान्यांची नावे पुसटशीही उमटलेली नसतात. एखादे स्वप्न, एखादं ध्येय उराशी बाळगून, त्यासाठी सर्वस्वाची आहुती देत झपाटल्यासारखी जगणारी माणसे मात्र त्यांच्या पश्चातही कधीच न पुसणारा अमीट ठसा कालपटलावर उमटवून जातात आणि म्हणूनच दीर्घकाळानंतरही जनमानसावर अधिराज्य गाजवत स्मृतिरुपात अमर रहातात. प्रत्येक क्षेत्राचा आढावा घेतला, तर त्या त्या क्षेत्रातल्या किर्तीरुपाने उरलेल्या अशा अनेक महान व्यक्तिंचा महिमा आदर्शरुपात पुढील पिढ्यांना जगण्याची दिशा दाखवणारा दीपस्तंभ बनलेला

आपल्याला दिसून येईल. इथे प्रत्येक क्षेत्रातल्या वानगीदाखल कांही नावांचा  उल्लेख करायचा ठरवलं, तरी त्या त्या क्षेत्रातील अनेक महान व्यक्तींची असंख्य नावे मनात गर्दी करु लागतील आणि यातली कांही मोजकी नावे निवडणे म्हणजे इतरांवर अन्याय केल्याची रुखरुख मनाला लागून राहील. चित्रपटक्षेत्र, नाट्यक्षेत्र,  गायन, वादन, नृत्यादी कला, लेखन, वक्तृत्त्व, शिक्षण, क्रिडा समाजसेवा… कोणतंच क्षेत्र याला अपवाद नाही. झोकून देऊन काम केलेल्या आणि दर्जाच्या बाबतीत कधीच कसली तडजोड न करता आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणार्या या क्षेत्रांतील असंख्य व्यक्तिंचा महिमा कालातीत आहे हीच त्यांची महानता..!

राजकारण हे क्षेत्र तसं दलदलीचं. भल्याभल्यानाही लोकानुनयासाठी तडजोडी करीतच इथे श्वास घेता येतो यावर विश्वास ठेवायला भाग पाडणारं हे क्षेत्र..! पण याही क्षेत्रात वीर सावरकर, म.गांधी, बाबासाहेब आंबेडकर, सी. डी. देशमुख, लालबहादूर शास्त्री अशी मोजकी का होईना चटकन् आठवणारी नावे आहेतच. क्षेत्र कोणतेही असो महानतेच्या निकषावर खरी उतरतात ती तत्त्वनिष्ठ, प्रामाणिक, ध्येयाने पछाडलेली चांगल्या अर्थाने ‘वेडी’ माणसे..! आणि त्यांचाच महिमा निर्विवाद महान ठरतो.

अर्थात हा सगळा व्यक्तिगत महिमा लौकिकार्थाने, रुढार्थाने दखल घ्यावी असाच आहे.  पण माझ्यामते खरा ‘अपार’ महिमा काळाचाच..! अल्पकाळ, प्रदीर्घकाळ या अनेक काळरुपांच्या पलिकडचा हा ‘काळ’..! ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ म्हणतात त्यातला ‘काळ’नव्हे, तर ‘काळासारखं दुसरं औषध नाही’ म्हणतात ना, तो ‘काळ’..!

क्षण क्षणकाळासाठी येतो. क्षण क्षणात विरुन जातो. या विरुन गेलेल्या अविरत क्षणांचा बनतो तो हाच ‘काळ’..! दु:ख वियोगाचं असो, कांहीतरी निसटल्याचं, हरवून गेल्याचं असो, असह्य असो वा न विसरता येणारं असो, सगळ्या दु:खांवरचं काळ हेच एकमेव रामबाण औषध..! क्लेशकारक, दु:खदायी आठवणींची तिव्रता जसा हा काळ कमी करतो, तसंच सुखद, समृध्द आठवणी आपल्या कूपीत अलगद जपून ठेवत त्या आठवणींचा सुगंध वृध्दींगत करत असतो तोही हाच काळ..! एरवी महान वाटणार्या व्यक्तिंच्या कार्यकर्तृत्वाचा कस घासून पहातो

तो हा काळच आणि त्याच्या निकषावरच खरा महिमा, खरी महानता टिकून तरी रहाते किंवा विरुन तरी जाते. कोण चूक कोण बरोबर याचं उत्तर काळाच्याच उदरात दडलेलं असतं. काळाचा महिमा अपार, अपरंपार म्हणतात ते यासाठीच..!

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सरले वर्ष ☆ सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

☆  विविधा ☆ सरले वर्ष ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

जे ऊगवते ते मावळतेच हा निसर्गाचा नियमच!!

पण मावळतानाही पाऊलांचे ठसे ऊमटून जातात..

२०२० हे वर्षही आता मावळतीवर टेकलंय्…

कसं गेलं हे वर्ष?  फार नकारात्मक गेलं…या वर्षीच्या आठवणी जरुर राहतील  पण त्या भेदक,  भयावह,  भकास असणार आहेत….

म्हणावं तर सूक्ष्म, डोळ्यांना न दिसणारा पण आक्राळविक्राळ अस्तित्व बजावणार्‍या या विषाणुने सर्‍या जगाला विळखा घातला… त्याची ऊत्पत्ती कशी झाली, त्याचं ऊगमस्थान कोणतं हे वैज्ञानिक दृष्ट्या महत्वाचं असलं तरी ज्या पद्धतीनं त्याने समस्त मानवी जीवनालाच वेठीला धरलं ते अनुभवत असताना, नेमकी आपली भूमिका काय याचे आत्मसंशोधन अधिक महत्वाचे वाटते…… करोडो लोक बाधित झाले आणि लाखो बळी पडले…. आणि या सालाबरोबरचा हा थरारक संहार नव्या सालाचे ही बोट पकडूनच ठेवणार का हाही प्रश्न आहेच….

तशा जगात अनेक गोष्टी घडल्या…

जाॅर्ज फ्लाॅईड या कृष्णवर्णीय नेत्याचा मिनीआपाॅलीस अमेरिका या शहरात, अमानुष पोलीस कारवाईत मृत्यु झाला…

धर्मद्वेषाचे अघोर परिणाम सोसूनही पुन्हा पुन्हा तेच घडावे याचेच वैषम्य वाटते..

अमेरिकेत ट्रंप यांची सत्ता गेली. बायडेन नवे राष्ट्रपती म्हणून निवडून आले…भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांची ऊपराष्ट्रपती म्हणून निवड झाली….

आपल्या देशातही ठिकठिकाणी निवडणुका झाल्या..

घोडेबाजार झाले ..पक्षांची,  नेत्यांची अदलाबदल झाली.. देशहितापेक्षा मतलबी राजकारणाचेच वारे वाहिले.

बळीराजाचे बळी गेले .. निसर्गानेही झोडपले आणि राजकारणानेही पीडले…अंदोलने चालूच आहेत…

हाथरस सारख्या घटना घडतच आहेत…

कोरोनाच्या हकालपट्टीसाठी, दिवे लावले, टाळ्या वाजवल्या, थाळ्या बडवल्या, घंटानाद केले…

सीमेवर जवान शहीद झाले…श्रद्धांजल्या वाहिल्या….

पण या सगळ्या गदारोळात आर.के. लक्ष्मणचा, मानवजातीचा प्रतिनिधी मात्र होरपळून निघालाय…. पण २०२० या सरत्या सालाचा लेखनप्रपंच मांडताना केवळ घटनांचाच ऊहापोह करणे इतकाच हेतु नाही.

भल्याबुर्‍या घटना अव्याहत घडतच असतात.. पण या वर्षी  एका विषाणुने दिलेला भयावह, थरारक अनुभव हा केवळ न भूतो न भविष्यती..!!

जीवन स्तब्ध झाले! बंदीस्त झाले…भयाण डोहात बुडाले….तांडवी मंथनात घुसळून गेले… कलीयुगाचा हा अंतीम काळ… जगबुडीच ही.. महाप्रलय म्हणतात तो हाच… शंकराने तिसरा डोळाच ऊघडला…महेशाचं हे संहार सत्रच… मग इथे येउन मन थबकतं…संपलं नाही सारं.  संपणारही नाही .. हा सृष्टीचा नियमच नाही….बंदीस्ततेत, स्तब्धतेतही एक दार ऊघडतं.. अगदी आत, मनातलं..आणि अनादी काळाच्या पळापळीत खूप हरवलेलं पुन्हा गवसतं….

हरवलेली संसकृती, नीती, वाढलेला हव्यास, तुटलेली नाती, संवाद, गोडवे, माणूसपण, विनाकारण वाढलेल्या गरजा… या सर्वांचा नव्याने विचार करावासा वाटतो.

एक विषाणु येतो आणि विश्वाला संदेश देतो”

“घरात बसा… सुरक्षित रहा.”

नकारात्मक पार्श्वभूमीवर २०२० सालाने जर काही दिलं असेल तर आत्मसंशोधनाचं आवाहन…

म्हणून नव्या वर्षाचं स्वागत करताना मनाची मरगळ नको.

सृष्टीनं अंजन घातलंय् ..या संजीवन दृष्टीने नववर्षाला सामोरे जाऊ…

मानव कधीच निसर्गाहून श्रेष्ठ नाही .पण मानवाने निसर्गाची अनेक रौद्र रुपे पचवली आहेत… लढाऊ, अहंकारी वृत्तीने नव्हे तर शरणागत होऊन निसर्गाची पूजा बांधूया आणि येणार्‍या नव्या वर्षाचे स्वागत करुया…..!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वासुदेव…☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ वासुदेव… ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

जरा विसावू या वळणावर

मंडळी नमस्कार, इंग्रजी वर्ष २०२० चा हा शेवटचा मंगळवार म्हणजेच यावर्षी साठीचा हा शेवटचा स्तंभ लेख. अजून २ दिवसात हे वर्ष संपेल. केंव्हा एकदा हे वर्ष संपतय असं सगळ्यानाच वाटतयं, याची कारणे सांगण्याची गरजच नाही, ती प्रत्येकाला माहिती आहेतच. अर्थात १ जानेवारी २०२१ पासून लगेच काही चांगले घडेल असे नाही. किंबहुना नवीन नवीन बातम्या येत असताना परिस्थिती तशीच राहण्याची शक्यता जास्त दिसते आहे.

काही खास दिवस असतात ज्या दिवसांपासून आपण नवीन सुरवात करु, झालेल्या चूका टाळू, नव्या जोमाने कामाला लागू, जास्त प्रयत्न करु असे वाटते त्यातील एक दिवस म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस.

अनेक जण नवनवीन ठराव/ नियम ( दरवर्षी प्रमाणे)  ठरवतील, अनेक जण पूर्णत्वास नेतील. आमच्यासारख्या काहीजणांचा वेळ दरवर्षी प्रमाणे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुढील वर्षात काय करता येईल (नवीन) हे चाचपण्यातच जाईल. तरी देखील यामागची भावना महत्वाची ठरेल.

मोठ्याला कंपन्या आपला ताळेबंद मार्च एन्डींग झाल्यावर मांडतात. १ एप्रिल पासून त्यांचे नवीन फायनान्शीअल वर्ष सुरु होते. अनेक व्यापारी दिवाळीत ( पाडवा) नवीन चोपडी घेऊन नववर्षाची सुरवात करतात. सामान्य जण एक तर वाढदिवस किंवा बहुतेक वेळा नवीन वर्ष हे आपल्या इव्हाॅल्यूएशन साठी धरतात. १ तारीख आली नवीन वर्ष कसे जाईल यासाठी जोतिषांकडे ही अनेकांची विचारणा होते.

म्हणूनच हे वळण मला महत्वाचे वाटते आणि प्रत्येकाने  ‘भले बुरे जे घडून गेले’ ते विसरून नव्या वळणावर नव्या उर्मीने तयारीत राहिले पाहिजे.

मंडळी यावर्षी मी काय नवीन गोष्ट शिकलो सांगू?  तर यावर्षी मी आत्तापर्यंत कधीही न खेळलेला मोबाईल गेम ‘ कॅन्डी क्रॅश ‘ खेळलो. एकदम भारी. मस्त गेम आहे. दिलेली टास्क  सुटून पुढच्या लेवलला गेलं की भारी वाटायचं. सध्या १५१ च्या पुढं असेन. पण सुरवातीच्या सोप्या लेवल नंतर एक एक लेवल सुटायला २-२ दिवस लागू लागले. कधी कधी हरतोय असं वाटत असतानाच अचानक शेवटच्या क्षणी लेवल सुटायची. मग त्या येणाऱ्या स्माईली वगैरे वगैरे. किंवा मग out of moves, level failed, you did not reach the goal हे तर ठरलेले. मग परत पहिल्यापासून ती लेवल यात पण एकच लेवल ठराविक वेळा खेळून ही सुटली नाही की हा खेळ एक टाइम लिमीट देतो. १० मिनिटांन पासून ते ३० मिनिटांपर्यत तुम्हाला हा खेळ खेळताच येत नाही. तोवर तुम्ही कदाचित इतर काही कराल पण हा खेळ खेळू शकणार नाही. त्या टाईम लिमीट नंतर परत सुरवात करायची खेळाला.

काही येतंय लक्षात ☝?. अशी लेवल म्हणजे जीवनात येणाऱ्या अडचणी. सुटत नसतील तर थोडं थांबायचे. चक्क दुर्लक्ष करुन दुस-या गोष्टीत मन रमवायचं आणि ‘जरा विसावू या वळणावर’ नंतर नव्या जोमाने कामाला लागायचं. पटतयं का सांगा.

आणि थोड्या कालावधी नंतर जिवनातील अवघड गणित/ त्रासदायक काळ /परिस्थिती  सुटायला लागली  की आपणच आपणाला शाबासकी द्यायची आणि म्हणायचं

wonderful, level completed

मंडळी आजची , टवाळखोरी आवरती घेता घेता, आज श्रीदत्त जयंती निमित्य दत्तमहाराजांच्या कृपेने येणारे नवीन वर्षे  सर्वांना सुखाचे ( ब्रह्मा), समाधानाचे( विष्णू) आणि चांगल्या आरोग्याचे( महेश्वर)  जावो या सदिच्छा

( शुभेच्छूक)  अमोल+

©  श्री अमोल अनंत केळकर

२०/७/१८

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares