मराठी साहित्य – विविधा ☆ फिरूनी नवी जन्मेन मी ☆ सौ. अंजली गोखले

☆ विविधा ☆  फिरूनी नवी जन्मेन मी ☆ सौ. अंजली गोखले ☆

सकाळपासून गल्लीमध्ये काहीतरी विचित्र हालचाल जाणवत होती. त्या वृक्षाच्या आसपास ज्यांच्या गाड्या होत्या त्या हलवण्यासाठी सगळ्यांना फोन केले गेले. कुऱ्हाडी, मोठाले दोर घेऊन माणसे झाडाभोवती गोळा झाली होती.. सगळेजण  वर बघून बघून निरीक्षण करत होते.  अन ते दृश्य बघून माझ्या मनात चर्र झाले.संशयाची पाल मनात चुकचुकली. आम्हा  मैत्रिणींना जे होऊ नये असे वाटत होते तेच घडणार होते.

काही वर्षापूर्वी मुद्दाम कोणीही वृक्षारोपण न करता समोरच्या बिल्डींगच्या बाहेर एक इवलेसे झाड वाढायला लागले होते. ना कोणी त्याला पाणी घालत होते, ना कोणी त्याची निगा राखत होते.बघता बघता त्याचे खोड गलेलठ्ठ झाले,वेगाने त्याच्या फांद्या इतस्ततः फैलावत गेल्या. छोट्या-छोट्या हिरव्यागार पानांनी डोळ्यांना गारवा दिला.ते झाड अलगदपणे सावली द्यायला लागलं. रखरखीत उन्हामध्ये जाणा येणाऱ्या ला दोन मिनिटांचा का होईना. पण शांतपणा जाणवायला लागला.

झाडाच्या टोकाला झिप्री गुलाबी नाजूक नाजूक फुले डोलायला लागली. आमच्या मनाला ते झाड आनंद,विसावा,गारवा द्यायला लागलं. पण त्याच वेळी याच वाढलेल्या फांद्या मुळे बिल्डिंग मध्ये अंधार पडायला लागला. झाडाच्या पानांची पानगळ होऊन घरामध्ये उडून येऊन कचरा व्हायला लागला. झाडणार्‍या म्युनिसिपालिटीच्या कामगारांनाही त्या वाळक्या पानांचा कचरा त्रासदायक व्हायला लागला. रोज त्या झाडाला शिव्या घालत घालत, झाडून वाळलेली पाने त्याच झाडाच्या बुंध्यापाशी जाळायला सुरूवात झाली. बिचारे झाड ते चटके सहन करत होते. आपला देण्याचा स्वभाव ते सोडत नव्हते  की चटके देणाऱ्याला शिव्याशाप मुळीच देत नव्हते.

एकदा अशीच एक माकडांची टोळी आली. त्या झाडावर उड्या मारुन मारुन धुमाकूळ घालायला सुरुवात केली. बिल्डिंगच्या गॅलरीमध्ये त्यांनी हैदोस घातला आणि झाडाबद्दल चा लोकांचा दुस्वास वाढायला लागला. सगळ्यांना ते नकोसे झाले. त्या झाडाच्या सावली पेक्षा,त्या शीतल गारव्या पेक्षा लोकांच्या डोळ्यांमध्ये तिरस्काराचे अंगारे फुलत गेले.

अखेर बहुमताचा विजय झाला आणि त्या आमच्या लाडक्या,डेरेदार हिरव्यागार वृक्षावर सपासप कुऱ्हाड चालवायला सुरुवात झाली.बघता बघता झाडाच्या फांद्या रस्त्यावर कोसळत होत्या.वेदनांचे घाव झेलत तो वृक्ष निर्दयी माणसापुढे शरण येऊन आपली होणारी कत्तल मुकाट्याने सहन करत होता. ज्या इवल्याशा रूपाचे डेरेदार वृक्षा मध्ये रूपांतर व्हायलाअनेक वर्षे लागली,तोच डेरेदार वृक्ष बिना फांद्यांचा बोका बोका दिसायला लागला काही तासांमध्ये!

हाच तो वृक्ष होता जो हवेतील कार्बन डाय ऑक्साईड वायू शोषून घेत होता आणि आम्हाला हवा असलेला ऑक्सिजन फुकट देत होता. जो आपल्या हिरव्या पानांच्या मदतीने आपले अन्न आपणच बनवत होता. त्यांनी आमच्याकडे कधीही भीक मागितली नव्हती, “द्या हो आम्हाला खायला. द्या हो आम्हाला पाणी प्यायला”. आपल्या मुळां वाटे आपल्यालालागणारे पाणी आपल्या पण तो मिळवत होता. उंच उंच गेलेल्या फांद्यांच्या शेवटच्या पानापर्यंत ते पाणी पोहोचवत होता.

त्याच उंचीपर्यंत पाणी घेण्यासाठी आम्हाला इलेक्ट्रिक मोटर लागते. त्यासाठीचे बिल आम्ही भरतो. एक पैसाही खर्च न करता आपली गरज तो आपणच पूर्ण करत होता. आम्हाला सावली देत होता पण आम्हाला त्याचे हे फायदे, तो उपयोग कधीच दिसला नाही.

एक मताने झाडावर कुऱ्हाड मारून मारून संध्याकाळपर्यंत त्या महान वृक्षाचे होत्याचे नव्हते झाले. रस्त्यावर मोठमोठाल्या लाकडांचा खच पडला होता. निष्प्राण पाने जमिनीवर झोपली होती. पानांचे, फांद्यांचे, खोडाचे श्वास घेणे पूर्णपणे थांबले होते. आता फक्त निर्जीव लाकडे झाली होती.संध्याकाळ पर्यंत टेम्पो मधून लाकडाचे ओंडके भरून भरून नेले गेले. निर्जीव हिरवी पाने जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांनी आणखीनच मारून टाकली.

अंधार पडला, रात्र झाली. झाडाच्या त्या रिकाम्या रिकाम्या जागेला मी मनोमन श्रद्धांजली वाहिली. “किती जरी तुझा त्रास झाला तरी तू आम्हाला सावली दिली होतीस रे! आमच्या डोळ्यांना तुझ्या हिरवाईने गारवा दिला होतास.”

रात्री लवकर झोप लागेना. तो प्रचंड वृक्ष डोळ्यासमोरून हलत नव्हता. तेवढ्यात माझ्या कानाशी कोणी कुजबुजले, “अगं वेडे,.. नको मनाला लावून घेऊ. आमचे संपूर्ण आयुष्यच तुमच्याच साठी आहे. आम्ही हवा शुद्ध करतो, तुम्हाला फुले फळे देतो, सावली देतो. थोडं स्पष्ट बोलतो वाईट वाटून घेऊ नको, टेम्पो मधून जी सगळे लाकडे भरून ने ली गेली ना, ती सुद्धा तुमच्या शेवटी तुम्हालाच उपयोगी पडणार आहेत. तुला एक सांगतो तुझ्या घरी एक फुलझाड लाव ना ! येईनच मी तुला भेटायला फुलांच्या रूपात.

इवलेसे रोप माझ्या स्वप्नांमध्ये रुजले आणि वाढायला लागले.

© सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आधुनिक शाळेतील एक दिवस ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ आधुनिक शाळेतील एक दिवस ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

(सर्व पात्रे आणि लेख काल्पनिक)

चांगली हायस्कुलच्या  ७ वी तील एक वर्ग. शनिवारचा  सकाळचा दिवस. शनिवारची अर्धीच शाळा असल्याने सगळे तसे आनंदातच होते.  हनुमान पूजेचा सेक्रेटरी  लवकरच आला होता. द्रोणागिरी पर्वत उचलून घेऊन जात असलेला हनुमानाचा फोटो  त्याने पेन ड्राईव्ह वरून मेन सर्व्हर  वर उतरवूनन घेतला होता. जे वर्गात येत होते त्यांच्या कडून  डेबिट / क्रेडिट कार्ड घेऊन  तो वर्गणीच्या मागे लागला होता. हळूहळू एक एक जण वर्गात येत होते  आणि आल्या आल्या आपला लॅपटॉप चालू करत होते. संगणक चालू होता क्षणी लॉगिन आय डी आणि पासवर्ड टाकला की आपोआप हजेरी लागायची.

बंड्या आल्यापासून लॉगीन करण्याचा प्रयत्न करत होता पण  ते होत नव्हते. २-३ दा  तसे झाल्यावर त्याच्या लक्षात आले या महिन्याची फी भरण्याचा कालचा शेवटचा दिवस होता आणि त्याने फी भरली नव्हती. शेवटी स्पेशल परमीशन घेण्यासाठी तो तडक मुख्याध्यापकांकडे पळाला.

जग्गू वर्गात आला तेच जरा रागावत. त्यात ‘स्वाइप से  (मशीन) करेंगे सबका स्वागत’ असे म्हणत जेंव्हा मारुती पूजेचा सेक्रेटरी त्याच्या जवळ पोचला  तेव्हा  तो म्हणाला  नाही देत वर्गणी जा.  काल गुरुजींनी रात्री उशीरा व्हाटसप ग्रुप वर घरचा अभ्यास  म्हणून निबंध लिहायला सांगितला होता  ‘व्यसन शाप की वरदान’. जग्गूने या सेक्रेटरीला  मेसेज टाकून  हिंट/मुद्दे  देण्यास सुचवले होते पण त्याचा रिप्ल्याय न आल्याने तो रागावलेला होता.

इकडे चंपा आज लँपटाॅप चा चार्जर आणायला विसरली होती. तिने राणीकडे मागताच तिने नकार दिला. म्हणाली तू माझ्या मेसेजना ग्रुपवर एकदा तरी लाईक देतेस का? मग मी का म्हणून देऊ CHARGR? प्रश्न रास्त होता.

या सगळ्या गडबडीत  वर्ग शिक्षक आले. रिमोट कंट्रोल ने त्यांनी डिजिटल फळा खाली घेतला आणि त्यांचा संगणक चालू करून प्रोजेक्टर  वरून  डिजिटल फळ्याशी लींक केला.  सर्वाना ३०/१२ तारखेवर क्लिक करायला सांगितले.  तत्क्षणी मारुती राया आले. त्यांची डिजिटल पूजा झाली, भीमरूपी स्तोत्र mp3  वर वाजू लागले, आरती झाली  आणि नंतर प्रसाद म्हणून ( प्रत्यक्ष ) खोबरे दिले गेले. त्यानंतर प्रत्येकाच्या संगणकावर आजचे वेळापत्रक पॉप -अप झाले.

पहिलाच तास गणिताचा निघाला. आज सर शिकवणार होते चक्रवाढ जीएसटी आणी रोजचे बदल हे कोष्टक. फळ्यावर दिसणारे आकडे आले तसे गेले. यात मोजक्या हुशार मुलां शिवाय कुणाला काहीही कळले नाही

दुसरा तास होता संस्कृत.  आफळे सर वर्गात आले  आणि त्यांनी भगवद्गीतेतील एक श्लोक  शिकवायला घेतला.  त्यातले ‘सोमरस’ चे वर्णन वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या.. आफळे सरांनी ही मग  मुलांच्या मनातील सर्व प्रश्णांचे वेगवेगळी उदाहरणे सांगून  शंकानिरसन केले.हा तास संपूच नये असं पहिल्यांदाच सगळ्यांना वाटत होते. पण तेवढ्यात संगणकावर  नागरिकशास्त्र  तास पॉप-अप झाला. पण आज कुलकर्णी सर न आल्याने अचानक ‘अमरधाम’ खेळ म्हणून बदल आला.

इंडियन पिनल कोड पासून सुटका झाली म्हणून  मुल आनंदली आणि अगदी  फ़टाफ़ट  त्यांनी डेस्टोप वरचे  ‘अमरधाम अँप’ चालू केले. आज दोन ग्रुप करून पोकेमॉन  खेळायचे यावर वर्गातील तमाम  मुला – मुलींचे  एकमत झाले आणि हा तास कसा संपला ते कळलेच नाही

नशीब महिना अखेर आणि त्यात शनिवार म्हणून  तुम्हाला एवढेच वाचायला मिळालं, पूर्ण  दिवसाचा वर्ग भरला असता तर?  माझं/तुमचं काय खरं नव्हतं

पण  हे वाचतांना एकदा तरी मनाने शाळेत  जाऊन आलात ना?

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नशा ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ नशा ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

नशा म्हणले की आपल्या डोळ्यासमोर येतो तो एकच प्याला. हे एक अस व्यसन आहे जे बरेचदा जस्ट फॉर फन चालू होते. कधी मित्रांसोबत कधी पार्टी मधे, तर कधी आपण किती निगरघट्ट आहोत हे दाखवण्यासाठी, तर कधी आपले दुःख लपवण्याचे उत्तम साधन म्हणून. मधे एक एड आली होती A cigarette in my hand and I felt like a man. अरे म्हणजे तुम्ही सिगरेट ओढली नाहीत तर तुम्ही पुरुष नाहीत का?का फक्त सिगरेट ओढणारेच पुरुष असतात ? हा आता अर्थात नशा फक्त पुरूषच करतात अस नाही बरका. महिला तर आघाडीवर आहेत इथे ही अगदी कंधेसे कंधा मीलाकर. ही एक नशा झाली जी आपल्याला स्पष्ट दिसते. कारण ह्यात माणूस आपले संतुलन बिघडून बसतो. त्याच्या मेंदू वरचा ताबा उडतो, आणि त्याला आपण काय करतो आहे चूक बरोबर काही कळत नाही. पण अश्या अनेक नशा असतात ज्यांच्या आहारी बरेच जण गेलेले असतात आणि ती गोष्ट केल्या शिवाय त्यांना चैनच पडत नाही.

मला चहाची तल्लफ आली आहे अस तुम्ही बरेचदा बरेच जणांकडून ऐकले असेल. ती काय एक नशाच की. चहाची नशा. माझी आजी ना दर एक दोन तासांनी घोट भर चहा प्यायची, घोटभरच बरका, कधीही कप भर नाही. तिला विचारले असे का पीतेस, तर म्हणायची तल्लफ येते मग तेवढा पुरतो .काहीजणांना खाण्याची नशा असते. आणी खाणे तरी काय तर पिझ्झा, बर्गर, वेफर्स ,. आठवड्यातुन दोन तीनदा तरी ते लागतेच त्यांना. नाही मिळाले तर अगदी मिस करतात ते, म्हणजे नक्की काय मिस करतात हे अजून कळले नाही मला.

आत्ताच्या मुलांना एक भयंकर व्यसन लागले आहे, ते म्हणजे मोबाईल गेम्स खेळायचे. ते खेळता खेळताच त्यांच जेवण होत. आणि जर नाही मिळाला फोन हातात तर चक्क बेचैन होतात ती मुले मग हट्ट, रडारड, बेचैनी. पण मला सांगा त्यांना हे व्यसन लावायला कारणीभूत कोण? त्यांचे पालकच ना, सुरुवातीला मुलं एका जागेवर बसुन जेवावीत म्हणून आईच हातात हे खेळणे देते, का, तिला त्यांच्या मागे मागे फिरायचे नसते म्हणून, आमच्या लहानपणी आया गोष्टी सांगत भरावयच्या. रामायण, महाभारत भीमाची, कृष्णाची म्हणजे मुल एका जागी पण बसतं आणि गोष्टी रुपात त्यांना माहिती रुपी ज्ञान पण मिळत.

काही लोकांना कामाचे व्यसन असते, पैसे मिळविण्याचे व्यसन. पैश्यांशिवाय दुसर काही सुचतच नाही त्यांना, फक्त पैसा मिळवणे आणि त्यासाठी खूप काम करणे हेचव्यसन.वरकोहाॉलीक असतात ही माणसं. एखादा दिवस काम केल नाही तर बेचैन होतात.

अस्वस्थत होतात ही लोकं जणू सारे जग ह्यांच्या कामामुळेच चालू आहे अस वाटत असते ह्यांना.

थोडक्यात काय नशा ही नशाच असते मग ती कशाची ही असो. काही ना कामाची, तर काहींना मोबाईलची, काहीना ड्रग्सची असते तर काहीना आणि कशाची असते.

सहज मनाच्या कोपऱ्यातून ?

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

03.10.2020

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कोरीगड ☆ श्री विनय माधव गोखले

☆ विविधा ☆कोरीगड ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

रविवार १७ मार्च २०१९ रोजी आम्ही कोरीगडचा ट्रेक ‘केला’ असे म्हणण्यापेक्षा तो ‘घडला’ असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. काही गोष्टी आपण करायच्या म्हणून ठरवतो पण त्या तशा न होता घडते काही भलतेच! इतिहासात आपल्याला अशी अनेक उदाहरणे सापडतील. असे म्हणतात की ख्रिस्तोफर कोलंबस खरे तर निघाला होता इण्डिज बेटांच्या आणि मसाले व्यापाराच्या शोधात पण अपघाताने पोहोचला अमेरिकाला. त्या दिवशी आमच्याही बाबतीत थोड्याफार फरकाने असाच प्रकार घडला होता. म्हणजे “जाना था जापान, पहुंच गये चीन। समझ गये ना?”  नसेल समजले तरी हरकत नाही, पुढील वर्णन वाचा म्हणजे “समझ में आयेगा”! JJ

मोहन बरोबर पहाटे ५:४५ वाजता माझ्या घरी कार घेऊन पोहोचला. तिथून आम्ही हायवे ने पोहोचलो म्हाळुंगे गावात संदीपला घ्यायला. मोहन दातार, संदीप पाटील आणि मी असा आम्हा त्रिकुटाचा बेत होता ‘घनगड’ चा ट्रेक करण्याचा. म्हाळुंगेहून एका भलत्याच खडबडीत रस्त्याने नांदे-चंदे गावातून घोटावडे फाट्याला पोहोचलो. तेथून पुढे पौड-कोळवण रोड ने हाडशीला पोहोचलो. तिथे आम्हाला एक हिरवी मारुती जिप्सी पुढून येताना दिसली ज्यामध्ये विक्रम गोखले गाडी चालवताना दिसले. कदाचित ‘गिरीवन’ मधून परत येत असावेत. असो. तिथून तुंगा-तिकोना ह्या दोन गडांच्या मार्गाने पुढे निघालो. काही परदेशी पाहुणे सकाळसकाळी तुंगी गावाच्या त्या जंगलात जॉगिंग करताना दिसले. तुंगच्या बाजूने पुढे गेल्यावर असे लक्षात येत गेले की आम्ही मार्ग कुठे तरी चुकतोय. मग वाटेत एक-दोन जणांना घनगडाचा मार्ग विचारला तर त्यांनी “सरळ जात रहा!” असे सांगितले. एका फाट्याला डावीकडे वळलो तर पुढे ‘अम्बी व्हॅली क्लब’चे गेट लागले पण तिथे गेट असल्याने मार्ग बंद झाला. मग पुन्हा उलटे फिरून  फाट्यापाशी आलो व उजवीकडे वळून निघालो. वाटेत आम्हाला चार-पाच Harle Davidson मोटरसायकलस्वार प्रचंड वेगाने आडवे गेले तेव्हा हळूहळू लक्षात आले की आम्ही लोणावळ्या कडे निघालो आहोत. वाटेत एकाला विचारले तर तो म्हणाला “घनगड कुठाय माहीत नाही. पण तुम्हाला ‘कोरीगड’ ला जायचे का? इथून सरळ गेलात तर पेठ शहापूर गाव लागेल तिथे ‘कोरीगड’ दिसेल. आम्ही तिघांनी तसाही ‘कोरीगड’ पहिला नव्हताच. मग सरळ तिकडेच ट्रेक करायचा तडकाफडकी निर्णय घेतला. सरतेशेवटी कोरीगड दिसला. गडाच्या पायथ्याशी कार लावून आम्ही चौकशी केली तेव्हा कळाले की घनगड तिथून पुढे १६ किमी दूर आहे. असो. पण तो विषय आता संपला होता.

आता ’कोरीगडा’ कडे वळूयात… हा गड कोराईगड, शहागड (गडाची पेठ शहापूरला असल्याने)ह्या नावानेही ओळखला जातो. पायथ्याच्या गावाचे नाव ‘आंबवणे’ आहे. ह्या नावावरूनच त्याच्या भोवतीने सहारा ग्रुपने वसवलेल्या अतिश्रीमंतांच्या वसाहतीचे नाव ‘अंबी व्हॅली’ पडले आहे. त्याबद्दल अधिक माहिती पुढे…

प्रथमदर्शनी कोरीगडाचा आकार आकाशात तिरप्या गेलेल्या  सुळक्यांमुळे थोडा विचित्र दिसतो. पण माथ्यावर मात्र चांगलेच विस्तीर्ण पठार आहे. गड तसा खूप उंच नसला तरी रेखीव तटबंदीने मढवलेला आहे. आंबवणे गावातून चढण्याची वाट जरा जिकिरीची आहे पण मुख्य वाटेने चढल्यास पाऊणेक तासात सहज चढाई होते. सुरुवातीलाच पुरातत्वखात्याने उभारलेला गडाचा इतिहास सांगणारा फलक आपले लक्ष वेधून घेतो. पुढील वाट एका घळीतून आणि नंतर जंगलातून जाते. वळसा घालून गेल्यावर एक छोटी सपाटी लागते.

निम्या वाटेच्या वरपासून तर पायर्‍याही बांधल्या आहेत.  उजवीकडे एक प्राचीन गुहा आणि गणपतीची मूर्ती दिसते.

वरती पोहोचल्यावर गणेश दरवाजा लागतो आणि मग तुम्ही गडाच्या माथ्यावर पोहोचता.

सभोवतालचा परिसर एकदम विलोभनीय दिसला, पावसाळ्यात गेले तर खरेच हिरवेगार दृष्य पाहायला मिळेल, हे नक्की. आम्ही गडाच्या उजव्या तटबंदीवरून चालायला सुरुवात केली तेव्हा तटबंदीची डागडुज्जी करण्याचे व चिरे बसवण्याचे काम चालू पाहून सुखद धक्का बसला.

गडाच्या मध्यावर श्रीकोराईदेवीचे ना छत, ना भिंती असे प्राचीन पण उजाड अवस्थेतील मंदीर आहे. दोन मोठी पाण्याची तळीही दिसली. एका तळ्याजवळ दगडांच्या ढिगार्‍यामध्ये एक भग्न मूर्ती पाहून वाईट वाटले. मंदिराचा गुरव आमची चाहूल घेऊन बाहेर आला व गडावर काय पाहण्यासारखे आहे त्याची माहिती दिली. गडावरील भगवे निशाण असलेल्या बुरूजावरून पहिले तर खूप मोठा टापू नजरेस दिसला. समोर तिकोना, मोरगड, तोरणा ओळखता आले.

पुढे वळसा घालून आंबवणे गावाच्या बाजूच्या तटबंदीवरून खाली पहिले तर दोन भग्नावस्थेतील दरवाजे एकाखाली एक असे दिसले पण तिथे उतरण्याची वाट मात्र दगड कोसळून बंद झाल्यासारखी दिसली. त्याखालील वाट मात्र घनदाट जंगलात हरवलेली दिसली. महितगाराच्या मदतीशिवाय उतरणे अवघड वाटले.

त्याच तटबंदीवर एक तोफही उत्तम स्थितीत दिसली. येथपर्यंत चालून आम्हाला कडाडून भुका लागल्या असल्याने तिथेच एका झाडाच्या सावलीत बसून डब्यांवर मनसोक्त ताव मारला.

आमच्या बसल्या जागेवरून ‘अंबी व्हॅली’चा देखावा खूप छान दिसत होता. आता हयाविषयी थोडे…

सहारा ग्रुप ने विकसीत केलेल्या ह्या छोटेखानी नगरामध्ये मुंबईतील आणि देशभरातील बडेबडे उद्योगपती, सिने-नटनट्या, क्रिकेटपटू अशा घनाढ्याची आलिशान रो-हाऊसेस आहेत. त्याची खाजगी विमानाने येण्याजाण्याची सोय व्हावी म्हणून खास धावपट्टी बांधली आहे. आतमध्ये युरोप-अमेरिकेसारखे गुळगुळीत रस्ते बनवले आहेत. पाण्याच्या मोठमोठ्या टाक्या बांधल्या असून, जलशुध्दीकरण केंद्रही उभारले आहे. मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याला बांध घालून पाण्यावर तरंगते रेस्टॉरंट उभारले आहे. बोटिंगची सोय केली आहे. आम्हाला पूर्वी आडवी गेलेली मोटरसायकलस्वार मंडळी विमानाच्या धावपट्टीवरून एका टोकाकडून दुसरीकडे गाड्या उडवीत फिरताना दिसली. एम्ब्युलंस धावपट्टीच्या बाजूने फेर्‍या मारीत होती. तिथून कोणीतरी एरोमोडेलिंगची पांढरी लांब पंख असलेली विमाने अतिशय कौशल्याने उडवीत हवाई प्रात्यक्षिके करीत होते.

‘शिवलिंग’ पॉइंट

प्रदक्षिणा पूर्ण करून 3:30 च्या सुमारास आम्ही गड उतरायला प्रारंभ केला व पाऊणेक तासात उतरून आलो सुद्धा! खाली एक सरबत विक्रेता आणि त्याची बायको भेटले. लिंबू सरबत पिता-पिता त्यांच्या कडे मी सहज चौकशी केली. त्यांना विचारले की “इथे सचिन तेंडुलकरचा बंगला आहे का? इतर कोणकोण फेमस लोकांना आलेले पाहिले आहे?” तेव्हा काही धक्कादायक माहिती त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाली…. नवराबायको म्हणाले, “अहो इथे येक-दोन दिवसापुरते कोण येते अन् कोण जाते आम्हाला काही कल्पना नाही. एकतर विमानाने येतात, परस्पर विमानाने जातात. कारने आले तरी बंद काचेआड कोण बसलेले असते आम्हाला पत्याच लागत नाही. शिवाय खाजगी मालमत्ता असल्याने आम्हा स्थानिक ग्रामस्थांना आत प्रवेशच देत नाहीत. पूर्वी धुण्याभांड्याची, साफसफाईची कामे तरी मिळायची आता कोर्टाच्या आदेशाने मालमत्ता खरेदी-विक्री बंद आहे. इतकेच नव्हे तर पूर्वी केलेल्या 8-10 महिन्यांच्या कामाचे आमचे पैसेही मालकांनी बुडवले आहेत. स्थानिकांना रोजगार देत नाहीत पण मुंबई वरून बिहारी कामगारांना आणून त्यांना मात्र कामे देतात. तुम्ही सांगा हे योग्य आहे का?” कसे तरी बोलून मी आपलं त्यांचे सांत्वन केले व माहितीबद्दल आभार मानून निघालो.

परतीचा प्रवास आता लोणावळा मार्गे करायचा हे ठरवून मोहनने गाडी गियरमध्ये टाकली. परतीच्या मार्गावर ‘शिवलिंग’ पॉइंट लागला. तिथे विक्रेत्यांनी छोटीशी चौपाटी वसवलेली होती. थोडा वेळ तिथे फोटो काढून पुण्याच्या दिशेने कूच केले ते आयएनएस शिवाजीच्या बाजूबाजूने लोणावळामार्गे थेट घर येईपर्यंत विनाथांबा आलो.

एकंदरीत कोरीगडाची आमची आकस्मिक भेट श्रीकोराई मातेच्या कृपेने आनंदात पार पडली. “कोरीगड झाला, पण घनगड राहीला…” ही सल मात्र मनात बोचत आहे. आमची घनगड भेटीची पाटी अजून तरी कोरीच आहे. त्यावर “श्री गणेश” कधी लिहिला जाणार ते आता श्री गजाननाच्या घन-कृपेवरच अवलंबून आहे!

 

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जरा विसावू या वळणावर ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी

☆ विविधा ☆ जरा विसावू या वळणावर☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

असं म्हणतात की संधी आपल्या दाराबाहेरच उभी असते. दार उघडता क्षणी ती आत येते अन्यथा ती दुसरेच दार ठोठावते. संधीच सोनं करणं हा प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षेचा भाग ठरू शकतो.

बालपण तारुण्य आणि वार्धक्य अशा वळणांवरून जाणाऱ्या जीवन प्रवासात अनेक विसाव्याचे क्षण येतात. तसेच अनेक संधीही उपलब्ध होतात. दूरदृष्टी असलेला त्या संधीचं सोनं करतो. म्हणजेच त्या वळणावर तो जरा विसावतो. या गोष्टीचा झालेला फायदा त्याच्या जीवनपटावर प्रतिबिंबित होतं.

आज संपूर्ण मानव जातीला एकत्र या वळणावर थोडसं थांबायची वेळ आली आहे. एरवी आपण वैयक्तिक रित्या या वळणांवर आपापले निर्णय घेत असतो पण आता एकत्रित चिंतन करण्याची वेळ आली आहे.

करोना नावाच्या अस्मानी संकटाने गेले कित्येक महिने आपण सारेजण सैरभैर झालआहोत .सर्व थरातील, सर्व वयातील, सर्व व्यवसायातील लोकांना एकाच वेळी वेठीस धरले गेले आहे.इतकेच नव्हे तर सर्व देशांवर आणि सर्व जाती धर्मावर एकाच वेळी संकट ओढवण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. लहानापासून थोरापर्यंत रावा पासून रंका पर्यंत सामान्यांपासून ते शास्त्रज्ञ प्रंतप्रधान यासारख्या असामान्यांपर्यंत सर्वांना आव्हानात्मक असेच हे आहे .

हे अवघड आव्हान आपण संधी म्हणून स्वीकारले पाहिजे आणि या संधीचं स्वागत आपण आपली मनाची कवाडं उघडी ठेवून केलं पाहिजे

सध्या आपण सर्वजण जणू स्टॅच्यू झालो आहोत. आर्थिक गती चक्र थांबले आहे. प्रत्येकाचं मन लॉक झालंय .आता आपण अनलॉक व्हायला हवं. करोनाने दिलेल्या या तथाकथित विसाव्याच्या क्षणी काही गोष्टीचा परामर्श घ्यायला हवा.

आत्मनिर्भर भारताची हाक आपल्या रोमारोमात पोचली आहे. त्याची आता आपण कास धरायला हवी .कोणावरही अवलंबून असणे ही अगतिकता आहे हे विसरून चालणार नाही. महात्मा गांधींनी स्वावलंबनाची शिकवण आपणास दिली आहे तिचे विस्मरण होता कामा नये. कोणतेही काम हे मानव निर्मित असतं त्यामुळं ते मानवाला सहज साध्य असंच असतं. याची खूणगाठ मनाशी बांधायला हवी.

गृहिणी पासून व्यावसायिकांपर्यंत लहान मुलांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांनी हातात हात घालून ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ ही भावना स्वतःत रुजवून भारत विकसनशील कसा होईल हे सामाजिक भान राखले पाहिजे.

‘मेक इन इंडिया, मेड इन इंडिया’ यावर खूप सखोल विचार केला पाहिजे. परदेशी कंपन्यांच्या वस्तूंवर अवलंबून राहता कामा नये. आपल्या देशातील कुटिरोद्योग लघुउद्योग आणि मोठ्या इंडस्ट्रीज यांना लागणारा कच्चामाल आणि त्यातून तयार होणारे सामान याची व्यवस्था आपणच करू शकतो.आपल्या देशातील खेळणी ही आपल्या संस्कृतीला रिप्रेझेंट करणारी अशी आहेत मग चीनवर अवलंबून का ?

करोनाने आपल्याला आरोग्यम् धनसंपदा हा मूलमंत्र दिला आहे.’ सर सलामत तो पगडी पचास’ हे आता सर्वांना पटलेलं आहे .आपल्या शरीरावर प्रेम करायचं करोनाने आपल्याला शिकवलं आहे. आपल्या देशातील पूर्व परंपरागत योग साधना त्याचे अनुकरण इतर देशातील मंडळी करत आहेत ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या देशातील आयुर्वेद हे महत्त्वाचे ठरत आहे.’चरक संहिता’ आता पुन्हा आठवू लागली आहे.

इतर देशांच्या लाईफ स्टाईल चे अनुकरण करता करता आपण आपल्या देशातील आपल्या हक्काच्या सर्व गोष्टी विसरत चाललो आहोत हे जाणवतयं .आपल्या पूर्वजांनी आपल्यावर घडवलेले संस्कार आणि वागण्याच्या पद्धती स्वच्छतेचे नियम आपण धाब्यावर बसून इतरांचं अनुकरण करायला शिकलो. ही आपल्याकडून मोठी घोडचूक झालेली आहे.

आपलाच नमस्कार आपलं स्वागत करतयं. हस्तांदोलन करणं किंवा गळाभेट घेणं या गोष्टी चुकीच्या ठरू लागल्या आहेत. वरील सर्व गोष्टी लक्षात घेता आज आपण या वळणावर क्षणभर विसावा घेऊन आत्मचिंतन करावं आत्मपरीक्षण करावं असं वाटतयं .

आपण हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागलोयं असे नाही का वाटत?…….

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दिवाळी अंकांची न्यारी सफर ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

☆ विविधा ☆ दिवाळी अंकांची न्यारी सफर ☆ सौ. दीपा नारायण पुजारी 

दिवाळी अंकांची न्यारी सफर

“टाटा टाटांच्या टाटानगरीत

किमया करती हजार हात

लोखंडाची बघा कोंबडी

घालितसे सोन्याची अंडी “

ही चारोळी आहे  एका  बालदिवाळी अंकातली. गळ्याशप्पथ !! अभिनव पध्दतीनं चारोळ्यांचा वापर मुळाक्षरांची ओळख लहान मुलांना करुन देण्यासाठी मराठी दिवाळी अंकात केला गेला. आहे ना मजेशीर माहिती ! आनंद,छावा,छात्रप्रबोधन अशा  अंकांनी बालविश्व समृद्ध केलं दिवाळी आली की माझं मन पुस्तकांच्या दुनियेत जातं. दिवाळी अंकांच्या सफरीवर जातं

माझ्यातला वाचक, चातकपक्षी जसा पावसाची वाट बघतो, तसा दिवाळीआधी पासूनच दिवाळी अंकांची वाट बघत असतो. रंगीबेरंगी मुखपृष्ठांची प्रावरणे ल्यायलेले ते दिवाळी अंक पुस्तकांच्या स्टॉलवर असे काही मांडून ठेवले जातात की कपड्यांच्या भव्य शोरुम्सही लाजतील. पणत्या, आकाशदिवे यांच्याही आधीपासून दिवाळी अंक दिवाळीची चाहूल देत असतात. माझ्या पहिल्या बालवाचनाचा सवंगडी होता चांदोबा….  विक्रम वेताळ मधील वेताळ माझा सल्लागार होता. सावकाराचा लबाडपणा, राजाराणी, इसापनीतीमधील  नायक , गुलामांच्या कथा, यांनी बालवयातच एक मनोधारणा निर्माण केली. अजूनही स्मरणात आहेत  ती त्यातील चित्रं. दाट जंगल, दिमाखदार राजवाडे, पुष्करिणी (या शब्दाचा नेमका अर्थ कळण्यासाठी चांदोबा मासिक वाचायलाच हव.), लांब, जाडजूड शेपटा घातलेल्या मुख्य कथा नायिका, सावकाराच्या चेहर्‍यावरील हावरा भाव, अगतिक, फसलेला मित्र, लांडगे, कोल्हे असे प्राणी अशी कितीतरी चित्रं मन:पटलावर कोरली गेली आहेत.

किशोर मासिकानंही माझं किशोर वय अलगदसं त्याच्या पानापनातून सांभाळलं. कविता, कथा, कोडी, विज्ञानाची अभूतपूर्व दुनिया, शब्दकोडी, घरबसल्या करता येतील असे अनेक उपक्रम…. पानोपानी उलगडत जाणारं हे अक्षरधन म्हणजे हिरे माणकांपेक्षाही अनमोल खजिनाच जणू. त्यातील गोष्टी, त्यांचा आशय, तो वास, कागदाचा  तो गुळगुळीत स्पर्श, आणि त्या मासिकाचं डौलदार रुप मनात कसं घर करुन बसलयं. या अक्षरमोत्यांनी नकळत आम्हांला संस्कारक्षम केलं.

वय वाढत गेलं, शहाणं समजुतदार होत गेलं … खेळातून, उनाडक्या करण्यातून बाहेर  आलं.. पण.. वाचनात मात्र रमलेलच राहिलं.. याचं श्रेयही या नटून  थटून येणाऱ्या दिवाळी अंकानाच द्यायला हवं, हो ना? खमंग चकली खावी तशी या अंकांची चव मनाला खमंग, खुमासदार बनवायची. अलगद जिभेवर विरघळणारा सुग्रास लाडू जसा रसना तृप्त करुन बळ ही देतो तसे हे अंक वाचकांची मनं सुदृढ करत असत. कुरकुरीत पोहे, खरपूस खोबरं, तळलेले दाणे, डाळे, काजू यांनी नटलेल्या चिवड्यासारख मनातील भावना  देखील नटून चुरचुरीत होत असत. शंकरपाळीचा खुसखुशीतपणा जास्त चांगला की तिच्यामुळं तोंडभर पसरलेली  माधुरी जास्त अवीट असा प्रश्न पडतो ना? (ऊत्तरही या प्रश्नातच दडलय ना?) तसाच अगदी तसाच बुध्दीला, मनाला, डोळयांना या दिवाळी अंकांनी पौष्टिक  खुराक दिला आहे.

कधी यातल्या कवितांनी भावनांच्या सतारींची तार छेडली तर कधी व्यंगचित्रांनी गालावर हलकेच स्मितरेषा उमटवली. कधीकधी तर एकमेकांना टाळ्या देऊन अख्खं कुटुंब मोठ्या हास्यलाटेवर स्वार होत असे. (जत्रा, आवाज) वहिनी, गृहलक्ष्मी, स्त्री, मानिनी या अंकांनी अवघ्या स्त्री जातीवर अधिराज्य गाजवलं. त्यांचं हळवं, नाजूक भावविश्व तरल बनवलं. त्यातील काही विचारांनी त्या सजग, प्रगल्भ, कणखर, स्वावलंबी झाल्या. आत्मभान जागृत करण्यांतही हे दिवाळी अंक सहभागी आहेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

थोडासा प्रौढ, बुध्दीजीवी वाचक वर्ग किर्लोस्कर, अक्षर, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, ललीत, यांची वाट बघे. सामना, साधना केसरी, मनोहर सारख्या मासिकांना त्यांचा त्यांचा खास वाचकवर्ग असे. निदान दोन चार दिवाळी अंक घरात आल्याशिवाय सण साजरा होतच नसे.

मराठीतील पहिला दिवाळी अंक कै. काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी १९०९ साली संपादित केला.अनेक साहित्यिक निर्माण केले. तेंव्हापासून आजपर्यंत अक्षरसाहित्यानं समाजप्रबोधनाचा हाती घेतलेला वसा आजतागायत सुरु आहे.

साहस, महत्त्वाकांक्षा, स्वावलंबन या बरोबरच समाजाच वैचारिक परिवर्तन करुन सांस्कृतिक  जडणघडण  रुंदावून, सामाजिक आणि औद्योगिक सुधारणा घडविण्यात या मासिकांचा महत्त्वपूर्ण  सहभाग आहे. याच अंकांनी वाड्.मय कला विषयीची अभिरुची निर्माण केली आणि तिला एक उंची दिली. अजूनही दर्जेदार दिवाळीअंकात लिहिण्याचं आमंत्रण मिळणं हा लेखकांच्या अभिमानाचा विषय आहे. केवळ याचमुळं साहित्यकृती मार्फत होत असणार्‍या या दिवाळी अंकांच्या गाथेनं महाराष्ट्राचा सांस्कृतिक विकास कसा केला हे सांगणारी ही दोन उदाहरणं देण्याचा मोह मला टाळता येत नाहीय.

१९०९ सालच्या दिवाळी अंकात लक्ष्मीबाई टिळकांनी मोदकावर एक कविता लिहिलि होती. ती वाचून एका स्त्रीने त्यांना कवितेतूनच प्रश्न  विचारला होता ….

“मोदक बहु गोड असे, आकारही सुबक साधला असे.

तव भार्त्याचे ह्याला साह्य नसे का, कथी मला ताई?”

या प्रश्नाच्या उत्तरासाठी १९१० च्या अंकात लक्ष्मीबाई टिळकांनी पति-पत्नी ही कविता  लिहिली. आईकडून मुलीला मिळणार्‍या शिकवणुकीपासून संसारात रमलेल्या स्त्री पर्यंतचे वर्णन या कवितेत दिसत. तत्कालीन पतिपत्नींच्या संबंधांचं स्वरुपही त्यातून लक्षात येतं.

“लग्न नव्हे ते प्रेम केले, एकीकरण जीवांचे

त्या ऐक्याचे वर्णन करणे शक्य न आपुल्या वाचे

असे न जेथे संसाराचा केवळ तेथे शीण

पत्नी वाचून पती पांगळा, ती ही तशी पतिवीण”

असा समजावणीचा सूरही त्यातून  उमटतो.

संपादक रॉय किणीकर यांनी ‘चिमुकली दिवाळी’ नावाचा दिवाळी अंक लहान मुलांसाठी काढला होता. या अंकाचं मुखपृष्ठ जणू एक स्लेटपाटीच होती! त्यावर पेन्सिलनं लिहिता येऊ शकत होतं!! बालमनाचा विचार करुन त्यांना वाचनसंस्कृतीत सामील करुन घेण्याचं हे एक कौशल्यच आहे ना?

भाषा आणि संस्कृती एकमेकींच्या हातात हात घालून वाटचाल करतात. संस्कृतीच्या खुणा आणि प्रतिक म्हणून जुनं जपणं, वृध्दिंगत करणं हे आपलं कर्तव्य आहे. शतकाहून अधिक काळ दिवाळी अंक हे काम चोखपणानं करत आहेत. चारशेहून अधिक  दिवाळी अंक मराठीची पालखी खांद्यावर मिरवत आहेत. मराठीचा मराठमोळा बाणा, शहरी औपचारिकता, ग्रामीण तोरा, भाषेची नजाकत, यांच्या दिंड्या पताका उभारून मराठी मनाची मशागत करत आहेत.

नवीन अंकांचं कात टाकून समोर आलेलं डिजिटल  आधुनिक रुप तर जगभर पसरलेल्या मराठी मनातील काळ्या मायमातीची ओढ लावायला समर्थ आहे. हे ‘ई’ रुप हळवे मराठी भावबंध साखळदंडासारखे मजबूत  बनवतील आणि मराठीचा डंका सातासमुद्रापार निनादत ठेवतील यात शंका नाही.

असे हे दिवाळी अंक, त्यांच्या नाना कळा (कला), नाना गुण!

हे नसतील तर. . . . .

गत:प्रभ झणी होतील ना मनअंगणे

तेजलुप्त ते होतील ना शब्दचांदणे

असं म्हणावसं वाटतं.

 

© सौ. दीपा नारायण पुजारी

फोन.नं:    ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सादर करतो कला गजमुखा ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆ विविधा ☆ सादर करतो कला गजमुखा ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

आज ब-याच दिवसांनी लिहायचा योग आलाय. बेलवडीतील तुकोबांच्या पालखीच गोल रिंगण लाईव्ह पाहता पाहता विषय ही जरा वेगळा सुचलाय.

आपल्याकडचे भक्ती संगीताची (मराठी) मोठी परंपरा आहे. यातही ‘विठ्ठलाची भक्ती गीते’ ही  साधारण पणे सर्वाना माहीत असतात, आणि जास्त प्रसिध्दही असतात. आळंदी , देहू वरून पालख्या निघाल्या अन जसजशी आषाढी एकादशी जवळ येऊ लागते तसतसं  वातावरण एकदम भक्तीमय होऊन जाते. आजकालची न्यूज चॅनेलही वारीचा वृतांत दाखवताना मागे एखाद भक्ती गीत लावतात. हे सगळं सांगायचे  कारण म्हणजे   नुकतेच मला   माझे   सगळ्यात  आवडते गाणे / भक्ती गीत ‘इंद्रायणी काठी’ ऐकायला मिळाले. पंडित भीमसेन जोशींनी गायलेले हे गाणे केंव्हाही ऐकले की मला ब्रह्मानंदी टाळी वाजल्याचा आनंद मिळतो. ‘गुळाचा गणपती’ या सिनेमात पु. लं. नी ही हे गाणं अतिशय सुरेख  घेतले आहे.

मंडळी  या गाण्याबद्दल आणखी एक विशेष अशी माझी आठवण आहे.  पूर्वीच्या काळी कलाकार मंडळी उदा गायक, वादक आपली कला हे देवासमोर सादर कारायचे. देवळात जाऊन कुठलीही बिदागी/ मानधन न घेता आपली कला सादर करण्यामागे कृतज्ञताा व्यक्त करणे हा हेतू होता. एखाद्या कलेत प्राविण्य मिळाल्यावर  देवाचा आशिर्वाद घेऊन  पुढे जायचे ही भावना त्यामागे असायची.

पण आजकाल  sms सारख्या माध्यमातून मतांची भीक मागून सेलिब्रीटी बनलेल्या आणि अशाप्रकारे ‘अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या’ कलाकारांना ही माहितीतरी आहे का? असं वाटण्या इतपत परिस्थिती सध्याआहे. गणेशोत्सव मंडळ, महोत्सव, अॅवार्ड कार्यक्रमातील लाखाची बिदागी घेणारे कुठे आणी एकेकाळी देवासमोर कुठलेही मानधन न घेता ‘कला’ सादर करणारे कुठे?

अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच असे कलाकार आता शिल्लक असतील असे खेदाने म्हणावेसे वाटते.

एकदा सांगलीत मी  गणपतीच्या मंदिरात गेलो असतानाचा एक प्रसंग यानिमित्ताने सांगावासा वाटतो. १५-२० वर्षे झाली असतील या घटनेला. वेळ साधारण ११ची. मंदिरात काहीच गर्दी नव्हती. दर्शन घेऊन, प्रदक्षिणा मारुन सभामंडपात बसे पर्यत एक गायक आपली पेटी काढून सूर लावण्यात मग्न होते. बरोबर साथीला एक तब्ब्लजी होते. ते ही हातोड्याने तबला, डग्गा सेट करण्यात मग्न. मग मी जरा थांबलो. विचार केला. एखादं गाणं तरी ऐकून जाऊ. थोड्यावेळानी त्यांनी जे गाणं ‘गणपती समोर सादर केलं ते  गाणं होत ‘इंद्रायणी काठी’ शब्द कमी पडतील तो अनुभव सांगण्यासाठी. एखाद गाणं ऐकून अंगावर रोमांच उभे राहणे म्हणजे काय हे त्यावेळी मी अनुभवले. मूळ २-३ मिनीटाचे असलेले हे गाणे बुवांनी  वेगवेगळे आलाप वगैरे घेऊन चागलं १० मिनिट  रंगवल. काही खास जागा घेताना तब्ब्लजी कडे पाहून   आणि त्यानंतर तब्ब्लजीकडून ही योग्य अभिप्राय मिळताच पुढे जात जात हा १० मिनिटाचा सोहळा असा काही रंगला की बस.  गाणं संपलं. आता पुढचं गाणं ऐकून मगच निघायचे अशी मनाची तयारी झाली  होती पण क्षणार्धात पेटी, तबला डग्गा गुंडाळून दोघेही मार्गस्थ झाले. पण ते गाणे मात्र माझ्या मनात कायमचे घर करुन गेले. जेंव्हा जेंव्हा हे गाणं ऐकतो तेंव्हा नकळत मी सांगलीच्या गणपती मंदिरात पोचलेलो असतो.

मंडळी आपण ही असे अनेक कलाकार देवळात आपली कला सादर करताना पाहिले असतीलच छान वाटतं ना असं काही पाहिलं की!

आपल्या पैकी आज अनेकजण वेगवेगळ्या कलेत निपुण आहेत. यानिमित्याने कलाकार मंडळींना अशी विनंती करावीशी वाटते की तुम्ही कलाकार म्हणून खूप मोठे व्हा पण मोठे झाल्यावर या कलेच्या अधिपती जो गणपती आहे (६४ कलांचा अधिपती) त्याचा विसर न करता जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्ह्या विनामोबदला आपली कला शक्यतो गणपतीच्या देवळात, गणेशा चरणी (किंवा इतर कुठल्याही देवळात) अर्पण करा आणि त्याचा आशीर्वाद घेऊन पुढे चला.

पाश्च्यात्य विचार सरणीत यालाच Grattitude व्यक्त करणे असं काही तरी म्हणतात

मंडळी मी तर टुकार लेखक पडलो. लेखनाचे मानधन मिळणे वगैरे या गोष्टी तर केव्हाच इतिहासजमा झाल्यात. तरीपण  जे काही थोडेबहुत लिहायला सुचले ते गणेश कृपेनेच.

‘सादर करतो कला गजमुखा’ या न्यायाने हे लेखन आज त्याच्याच चरणी आणी बुध्दीचा कारक ग्रह ‘बुध’ यालाही अर्पण करुन सध्या इथंच थांबतोय.

सादर करतो कला गजमुखा

रिध्दी सिद्धीच्या वरा

शुभारंभीया करितो तुजला

वंदन हे गजवरा

 

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रतिबिंब ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी

☆ विविधा ☆ प्रतिबिंब  ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

चिमण्या घरातल्या आरशावर येऊन टोची मारत बसतात. हा बिलोरी आरसा त्यांना आकर्षित करतो खरा, पण ‘आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी’असं काहीसं होऊन जातं. स्वतःच्याच प्रतिबिंबाची त्यांच द्वंद्व सुरू असतं.

त्या दिवशी दुपारी अशीच एक चिमणी पंख फडफडत आली आणि आरशावर बसून टोच्या मारू लागली. तो टकटक आवाज ऐकून माझीही झोप चाळवली गेली.आरशावर टोची मारायचं चिमणीचं प्रयोजन ती थोडीच मला कानात सांगणार होती?….भुरकन गेली देखील उडून ती…..

विचारांचा भुंगा माझ्या भोवती भुण भुण करू लागला. लहानपणी गोष्टीत वाचलेला सिंह आठवला. स्वतःचे प्रतिबिंब विहिरीत पाहून विहिरीत उडी मारणारा..

चिमणीला आरशातले प्रतिबिंब म्हणजे दुसरी चिमणीच आहे असं वाटत असेल का ? म्हणूनच तर ती तिच्याशी भांडत असेल का ?नाही! नाही! गरीब बिचारी… ती कशाला भांडेल ? मग गप्पाच मारत असेल का तिच्याबरोबर?

माझं मन माझ्या प्रश्नांना अनुत्तरीत झालं.

माझं त्या चिमणीशी मूक संभाषण सुरू झालं “अगं वेडाबाई, आभासी आहे गं सगळं !तू जर तिच्याबरोबर भांडत असशील तर ते तुझंभांडण स्वतःशीच आहे आणि जर गप्पा मारत असशील तर स्वतःशीच किती वेळ बोलणार?त्यापेक्षा माझ्याशी बोल ना!! इटुकली धिटुकली तू मला खरच खूप आवडतेस गं! असं म्हणून मी उठले तर ती भुरकन उडून गेली. ती पुन्हा परत यायची मी वाट बघू लागले. मनातलं सगळं बोलणार होते मी तिच्याशी…..

बऱ्याच वेळाने ती परत आली.’आता नाही हं तुझ्या जवळ येत मी !आवडत नाही ना मी तुला ?ठीक आहे.तू आपली तुझ्या मैत्रिणीशी बोल किंवा भांड… मला काय करायचे ?तुला माझी कदरच नाही. माझ्या मनांतल ऐकून घेशील तर शपथ!नुसतं टोच्या मारत बसली आहेस….

अग चिऊ, तू माझ्या बाळाची अगदी जिवाभावाची…..माझं बाळ लहान होतं तेव्हा अंगणात पोत्यावर त्याला बसवलं की लगेच तुम्हा मैत्रिणींचा घोळका चिवचिवाट करत येत असे. फेर धरून तुम्ही सगळ्या माझ्या बाळाच्या भोवती रिंगण करून नाचायचात आणि माझं बाळ बसल्याजागी उड्या मारायचं….. तुम्हाला ते मुठी मुठी भरून जोंधळ्याचे दाणे भिरकवायचं.तासनतास त्याला तुम्ही खेळवायचात तुला मी कशी विसरू?

माझ्या बाळाला तुझीच गोष्ट सांगून मी झोपवत असे. तुझी गोष्ट ऐकता ऐकता माझ्या बाळाच्या डोळ्यात नाजूक पावलांनी झोप यायची आणि माझं बाळ गुढुद झोपायचं. तू तुझं घर माझ्या घराच्या वळचणीला बांधलंस कारण माझ्या बाळाची अन तुझी गट्टी !काऊचं घर मात्र माझ्या बाळानं उन्हात बांधलं हं! माझ्या बाळाला तू घाबरत नव्हतीस पण माझ्यापासून का इतकी दूर पळतेस? एक नाही अन् दोन नाही.तिच्या टोच्या मारणं चालू होतं.

इतक्यात सोनाली आली आणि तिला म्हणाली, “आलीस वाटतं तू ?जरा चुकून पडदा सरकवायचा राहिला की हिचं आपलं टुकटुक टुकटुक सुरुच!आई, इथून हिला हुसकलं की ही शेजारच्या काकूंच्या कपाटाच्या आरशावर जाऊन बसते.

आई,आपल्यालाच फक्त आरशातलं प्रतिबिंब समजतं का गं? या पक्षी आणि प्राण्यांना का समजत नसेल?” तिच्या या प्रश्नावर मी विचार करू लागले.

शेजारच्या घरातल्या आरशावर गेल्यावर या चिमणीच्या मनांत पुन्हा तीच चिमणी इथे कशी आली हा प्रश्‍न येत नसेल का ?आरसा बदलला तरी प्रतिबिंब बदलत नाही हे हिला कसे कळावे ?दिसेल तिच्याशी भांडायचं वृत्ती असलेल्या या चिमणीला आरशातल्या चिमणीचा इतका राग का बरं येत असेल? दुसरी चिमणी म्हणून तर इतका राग राग करत नसेल ना ती?

माझ्या मनांत असाही विचार आला की जर आरशातले प्रतिबिंब म्हणजे आपणच आहोत हे तिला समजलं तर आपण आपलाच किती राग राग केला ह्याच तिला वाईट वाटेल का ?…

आताशा मी आरशात स्वतःचे प्रतिबिंब पाहते. चेहराच नव्हे तर मनही दिसतं का? हे शोधण्याचा प्रयत्न करते.आरशातील प्रतिबिंबकडे पाहते तेव्हा माझा चेहरा माझ्याशी बोलतो. तो माझ्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे तो माझ्या मनाचा देखील आरसा आहे. त्यामुळे प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर दिसते. माझं मन आरशासारखं चमकदार बनवायचा मी चंग बांधला आहे. एकदा का ते आरशासारखं चकचकीत झालं की माझ्या मनात मी डोकावले की माझं खरंखुरं प्रतिबिंब दिसेल. तेव्हा कदाचित ती स्वतःभोवती एक गिरकी घेऊन म्हणेन……

मी कशाला आरशात पाहू ग….

मीच माझ्या रुपाची राणी ग…..

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आम्ही मध्यम वर्गीय ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ आम्ही मध्यम वर्गीय ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

माझा होशील ना, सिरियल पाहिली आणि नकळत डोळ्या समोरून सारे बालपण गेले. सुखात होतो मध्यम वर्गीयात. श्रीमंतीत असणार्‍या लोकांसारखे जास्त अपेक्षेचे ओझे घेऊन फिरत नव्हतो डोक्यावरून. सुखी समाधानी होतो आम्ही . हव्यास संपतच नाही ह्या लोकांचा, अजून पैसा, अजून एक गाडी, अजून एक जागा खरेदी…..

कपाट भरलेले असते सिल्कच्या साड्यांनी, सुटनी आणि दागदागिन्यांनी. पण ही श्रीमंती मिरवताना स्वतः च कधी गरीब होऊन जातात मनानी, हेच त्यांना कळतं नाही. नात्यांच्या गोधडीला प्रेमाची ऊब लागते पैश्यांची नाही, हे त्यांच्या लक्ष्यातच येत नाही. आणी जेव्हा लक्ष्यात येते तोवर खुप उशीर झालेला असतो. रणरणत्या उन्हात एसी गाडीतून फिरतांना डेरेदार झाडाच्या सावलीचा आनंद कधीच अनुभवता येत नाही त्यांना.

ताजं कढवत ठेवलेल्या लोणकढी तुपाच्या वासाचा घमघमाट आम्हां मध्यमवर्गीयांनाच माहिती, तो खमंग वास रेडी बटर, आणि चिझ ला कुठे ?? जेव्हा घरी बेसनाचे लाडू बनताना खमंग वास दरवळतो ना, सगळीकडे आणि तोंडाला पाणी सुटते तो अनुभव फक्त आम्हालाच. भडंग करतांना लसणीचा खमंग वास घरभर फिरतो आणि वर्दी देऊन जातो ताज्या भडंगावर ताव मारण्याची, तो रेडीमेड भडंगात कुठे?

पॉकेट मनी साठवून आपल्या आई बाबांच्या वाढदिवसाला सरप्राईज गिफ्ट आणण्याचे सुख आमच्याच नशिबात, हां आता सो कॉल्ड ग्रँड पार्टी आमच्या दैवात नसेल, ना तो भपका आणि पैश्यांची उधळपट्टी, कारण आम्ही वर्षभर विचार करून साधारण तेच गिफ्ट घेतो ज्याची खरच गरज आहे आणि जे आमच्या खिशाला परवडणार पण आहे.

सगळीच नाही काही, पण असे बरेच श्रीमंत लोक आहेत जे फक्त आपला स्टेटस जपण्यासाठी पैश्यांची उधळपट्टी करतात. डिनर पार्टीला, एक पंधरा वीस तरी आयटम असतात खायला, ज्यातले निम्मे अधिक फुकट जातात. आम्ही भले दोनच जिन्नस करू पण वाया नाही कुठला घालवणार. आम्हां मध्यमवर्गीयांना गरजेला सारे काही पण उधळपट्टी कधी जमली नाही आणि श्रीमंतांना गरजेपुरते अस काही असते हेच कधी कळले नाही.

मला आठवतय चार लहान खोल्या असल्या तरी अगदी सगळे नातेवाईक मे महिन्यात जमलो की मस्त पंधरा पंधरा दिवस धमाल करायचो कधी अडचण नाही झाली आम्हाला कोणाची आणि तेच श्रीमंतीत राहणार्‍यांचा महाल असला ,तरी चार चे पाच जण झाले तरी त्यांची स्पेस हरवल्या सारखी वाटते त्यांना. आत्ता पटते माणसांच्या मनात स्पेस लागते, जागेत नाही.

श्रीमंतां सारखे गरजेपुरता माणूस, अस नसते आमच्यासाठी. लोकं कामापुरती मनात अस होत नाही. आम्ही नाती पैश्यांसाठी, कामापुरती जपत नाही, एकदा नाते जोडले तर ते मनापासून जोडतो आणि ह्रदयात जपतो कायमकरता. It is not a deal or contract for us or a source to earn money.काम झाले की हात पुसून टीशुपेपर सारखे फेकून देत नाही, कारण मुळात टीशुपेपर हेच आधी आमच्या संस्कृतीत बसत नाही.

मातीत बागडून, खेळून धडपडून मोठे झालो आम्ही. उन्हाचे चटके बसले की सावली कशी शोधायची हे शिकवायला लागले नाही आम्हाला. सुखी आहोत ह्याचे कधी नाटक नाही करावे लागले, कारण खरच होते त्यात सुखी होतो आम्ही. तेच श्रीमंतांना एसीत बसुन घाम फुटतो, आणि किती ही सुखी असला माणूस तरी वर्षाच्या शेवटी त्यांच्या balance sheet मधे समाधानी आहोत हे मांडावे लागते.

सहज मनाच्या कोपऱ्यातून ?

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

05.10.2020

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दत्तक विधान ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

☆ विविधा ☆ दत्तक विधान ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

कुणाचं नशीब कसं आणि कधी बदलेल ते सांगता येत नाही.

असाच एक घडलेला प्रसंग. रस्त्यात एका झुडुपात एका कुत्रीला चार पिल्ले झाली होती. भुकेने बिचारी खूप रडत होती. ओरडत होती. रस्त्याने जाणारे येणारे फक्त बघून पुढे जात होते. दुसरे दिवशी ही पिलांची आई आली नव्हती. तिचं काय झालं कोण जाणे? पिल्ल‌ सारखी आईसाठी आक्रोश करत होती. हर्षद ने चित्र पाहिले आणि त्याला रहावले नाही. त्याने चारही पिल्ले घरी आणली. घरात  कुरबूर झाली. त्यांना दूध दिल्यानंतर ती शांत झाली आणि झोपी गेली. त्यांना एका वेगळ्या खोलीत ठेवले. त्यांचं काय करायचं ते बघूया, असं ठरलं. पैकी दोन पिल्ले सांभाळायला चांगल्या घरी दिली. उरलेल्या दोन पिलांनी घरातल्या सगळ्यांना जीव लावला. मोठी झाली की राखण करतील असू देत आपल्याकडे असं ठरलं. त्या दोघांचं भाऊ-बहीणीच नामकरण झालं. गुंड्या आणि बंडी. दोघांच्या कुस्ती लपंडाव आणि अनेक खेळाने सर्वांची खूप छान करमणूक होत होती. आता त्यांनी सगळ्यांनाच लळा लावला होता.

घरातल्या सगळ्यांना अचानक परगावी जायलाच हव असं निमित्त निघाल. आता या दोन्ही पिलांचं काय करायचं? प्रश्नचिन्ह निर्माण झालं. शेवटी असं ठरलं की, “राहत” या प्राणी प्रेमी संस्थेत त्यांना देऊया. जड अंतकरणाने त्यांना त्या संस्थेत दाखल केलं. लवकरच बंड्या आणि गुंडी तेथील प्राणीपक्ष्यांबरोबर छान रुळली. मजेत राहू लागली.

या संस्थेतच मालकांनी दुर्लक्ष केल्याने, अतिश्रमाने, जखमी झालेली काही गाढवे जप्त करून, त्यांच्यावर उपचार करून बरी झाली होती. त्यांना डॉंन्की यार्डमध्ये उटीला पाठवायचे ठरले होते. (मसीनगुडी) उटी याठिकाणी डॉक्टर इलोना ओटर या नार्वेच्या व्हेटर्नरी डॉक्टर व त्यांचे पती नायजेल ओटर यांनी 20 एकर जागेत इंडिया प्रोजेक्ट फॉर नेचर ही संस्था सी स्थापन केली आहे. असे प्राणी मुक्तपणे मोकळे आणि निवृत्त जीवन जगत असतात. तेथे “राहत” मधील गाढवांना व त्यांच्याबरोबर बंड्या आणि गुंडी यांनाही पाठवायचे ठरले. समाजसेवी संस्था किंवा व्यक्ती तेथील प्राण्यांना दत्तक घेतात. म्हणजे त्यांचा खर्च पाठवतात. बंड्या आणि गुंडी उटीला पोहोचले. त्यांचे फोटो पाहून अमेरिकन जोडप्याने त्यांना पसंत केले. कागदपत्रांची पूर्तता झाली .दत्तकविधान झाले. त्यांच्या पालकांनी खर्च पाठवायला सुरुवात केली. नवीन मालकांनी त्यांची दत्तक नावे पा़ँल आणि नन्सी अशी ठेवली. बंड्या आणि गुंडीचे  पाँल आणि नैन्सी झाले.पूर्ण आयुष्य बदलून गेले. मराठी होते ते  अमेरिकन झाले.

रस्त्याच्या कडेला झुडुपात आईविना दिवसरात्र भुकेने कासावीस होऊन ओरडत राहिलेली बंड्या आणि गुंडी पाँल आणि नँन्सी होऊन आनंदी आणि मुक्त जीवन जगायला लागले. काय नशीब असतं ना एकेकाच!

 

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares