मराठी साहित्य – विविधा ☆ कृष्णा… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी  ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

🌸  विविधा  🌸

☆ कृष्णा… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

कृष्णा! तू अर्जुनाला युद्धभूमीवर गीता सांगितलीस आणि त्याचा मोह दूर केला व युद्धासाठी प्रवृत्त केलंस. कशाला रे! त्याने तर तुला म्हंटलं होतं नं? मला राज्यही नको व राज्याचा उपभोगही नको! मग तुला का सांगावसं वाटलं “तस्मादुत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः।” अन्याय सहन करण्याचा पायंडा पडायला नको. म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो, म्हणूनच नं!

आमची पुण्यभू ‘भारतमाता’ अजूनही आम्हाला प्रियच आहे. पण आमच्यात अजूनही हिंमत आलेली नाही की कुणी धर्माचं नाव सांगून आमच्यावर अत्याचार करत असेल तर आमच्याही धर्मातच कृष्णानी सांगून ठेवलंय की अन्याय झाला तर प्रतिकाराला सज्ज रहा म्हणून! तसेच कुठलाही दाखला, आवश्यक कागदपत्र मिळविण्यासारख्या छोट्या छोट्या हक्काच्या गोष्टींपासून लाच देत रहातो आम्ही, अन्याय सहन करत रहातो आम्ही. काही वाटेनासं झालंय आम्हाला त्याचं!

अर्जुनाच्या मिषाने आम्हाला पण सांगितलं आहेस तू; “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन”  पण तुला दैवत मानतांनाही कानाडोळाच करतो आम्ही त्याच्याकडे! लोकांचं राज्य आहे म्हणतांनाही आम्हाला मनासारखं ‘खातं’ मिळालं नाही तरी सिंहासन गदागदा हलवतच रहातो आम्ही! आम्हाला पाहिजे ते खातं मिळवून, त्याचं फळ स्वतः खाऊन मुलाबाळांसाठीही राखून ठेवायचंय नं! माखनचोर कृष्णाची दहिहंडी पहा किती उत्साहात साजरी करतो आम्ही?पण अहमहमिका पहा कशाची सुरूं आहे!तू माखनचोरीचा पायंडा घातला कशासाठी?सगळ्या गोरगरीब मुलांना ते माखन मिळून राष्ट्रकार्यासाठी त्यांचं पालनपोषण योग्य व्हावं व समान वाटप व्हावं म्हणून!आम्ही मात्र प्रेताच्या टाळूवरचं लोणी खायलाही सज्ज आहोत! कुणाकुणाला कौरवांसारखी शिक्षा होते, ते मात्र आम्हाला कधीच कळत नाही. आमचे आजचे गुरूकुलंही भ्रष्टाचारात मागे नाहीत बरं!

दुःशासनाच्या तावडीत सापडलेल्या द्रौपदीला वस्त्र पुरवायला तू तातडीने धावून गेलास. आज कितीतरी ‘द्रौपदी’ उद्ध्वस्त होतांना दिसताहेत. भर सभेत मान खाली घातलेले तिचे पती, तिचा मान राखायलाही पुढे सरसावले होते नंतर. तिचे पातिव्रत्य नाही नाकारले त्यांनी! आज मात्र अशा अन्याय झालेल्या ‘स्त्री’लाच खाली मान घालून जगावे लागते. नाहीतर ‘अरुणा शानबाग’सारखं उद्ध्वस्त होऊन जगावे लागते तिला.

अशा कितीतरी गोष्टी आहेत रे कृष्णा! पण तू म्हंटलं आहेस नं! 

“यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।”

मग आम्ही सारे अर्जुन झालो आहोत आणि तुझा जन्मोत्सव साजरा करतोय दरवर्षी. तू जन्म घ्यायची वाट बघत बसलो आहोत. दंग मात्र उत्सव साजरा करण्यातच आहोत. अरे बाबा, तू कृष्ण भगवान म्हणून ज्याच्या पाठीशी उभा राहिलास, ज्याला लढायला प्रोत्साहित केलेस, त्या अर्जुनाच्या अंगात लढण्याची धमक होती. पण आज एखादा कृष्ण उभा राहिला तर त्याला चहूं बाजूंनी घेरून नामोहरम कसे करायचे याची अहमहमिका लागली असते आमच्यात! त्यासाठी आम्ही सारे अर्जुन एक होतो. कारण तुझ्या दहिहंडीतून बाहेर आलेलं दही दुसर्‍या कोणाला घेऊ द्यायचे नसते नं आम्हाला!

त्यापेक्षा आता तू असंच कर!आम्हाला सगळ्यांनाच ठणकावून सांग!”धर्माला ग्लानि यायला तुम्ही सगळ्यांनी हातभार लावायचा. अन मी येऊन धर्माची संस्थापना केल्यानंतर तुम्ही परत गोंधळ घालायचा का? माझ्या एकट्यावर जबाबदारी का टाकता?घ्या सगळेच आपापल्या वाट्याचा जबाबदारीचा हिस्सा! सगळ्यांच्याच अंतःकरणात कृष्ण जन्म घेऊ द्या! मग कृष्ण जन्म घेण्याची तुम्हालाच ‘युगे युगे’ वाट बघावी लागणार नाही. “

कृष्णा तू खरंच असे ठणकावून सांग! आणि हो, या सगळ्यांमध्ये मी पण आहे बरं का? मी तरी कुठे काय करत असते?

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग २४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग २४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

 (पूर्वसूत्र- स्टॅंडच्या बाकावर बसून रात्र जागून काढताना सलगच्या धावपळीच्या प्रवासानंतरचा अपरिहार्य असा थकवा होताच पण त्याचा त्रास मात्र जाणवत नव्हता. पौर्णिमा अंतरली नसल्याचं समाधान माझ्या थकल्या मनावर फुंकर घालत होतं! त्याच मन:स्थितीत मी कधीकाळी ऐकलेले बाबांचे शब्द मला आठवले…

‘निश्चय केला तरी त्या निश्चयापासून परावृत्त करणारे प्रसंग सतत समोर येत रहातात, तेच आपल्या कसोटीचे क्षण! जे त्या कसोटीला खरे उतरतील तेच तरतात.. !’

त्या रात्री स्टॅंडवरच्या एकांतात बाबांच्या या शब्दांचा नेमका अर्थ मला माझ्या त्या दिवशीच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थाने समजला होता!!) इथून पुढे —- 

एरवी अविश्वसनीय आणि अतर्क्य वाटावीत अशी यासारखी अनेक घटीतं पुढे प्रत्येक वेळी मला मात्र ‘तो’ आणि ‘मी’ यांच्यातलं अंतर कमी होत चालल्याची आनंदादायी अनुभूती देत आलेली आहेत!

यावेळी पौर्णिमेची तारीख बघण्यात माझी नकळत झालेली चूक आणि त्यामुळे पौर्णिमेचं दर्शन अंतरण्याची निर्माण झालेली शक्यता हा बाबा नेहमी म्हणायचे तसा माझ्या कसोटीचाच क्षण असावा आणि केवळ अंत:प्रेरणेनेच मी सलग दोन रात्रींचं जागरण करून भुकेल्यापोटी आंतरीक ओढीने ‘त्या’च्याकडे धाव घेत कसोटीला खरा उतरलो असेन. कारण त्यानंतरच्या महाबळेश्वरमधील पुढच्या साधारण पावणेतीन वर्षांच्या कालावधीत अशी कसोटी पहाणारे क्षण कधी आलेच नाहीत. या प्रदीर्घकाळात ब्रॅंचमधील सगळी कामे, जबाबदाऱ्याच नव्हेत फक्त तर प्रत्येक पॅरामीटर्सवरील माझा परफॉर्मन्सही वरिष्ठांकडून मला शाबासकी मिळवून देणारा ठरत होताच, शिवाय दर पौर्णिमेलाही जाणिवपूर्वक नियोजन न करताच सगळं कांही निर्विघ्नपणे पार पडत होतं!आश्चर्य हे कीं या पौर्णिमेनंतरच्या पुढच्या अडीच-तीन वर्षातल्या कुठल्याच पौर्णिमेच्या प्रवासासाठी मला ना कधी रजा घ्यायला लागली ना कधी प्रवासासाठी कसला खर्चही करावा लागला. कारण नेमक्या त्यावेळी अचानक असं काही घडून जायचं की पौर्णिमेच्या जवळपास जसंकांही बँकेमार्फत दत्तमहाराजच मला बोलावून घ्यायचे!दरवेळी निमित्तं पूर्णत: वेगळी असत पण ती निर्माण होत ती मात्र पौर्णिमेच्या सलग आधी किंवा नंतर. आमचं रिजनल ऑफिस कोल्हापूरलाच होतं. तिथे कधी हिंदी वर्कशॉपसाठी ब्रॅंचतर्फे मला जावं लागे, कधी ब्रॅंच-मॅनेजर्स मीटिंगसाठी, कधी कोर्टात सुरू असलेल्या वसुली केसेसमधे साक्षीदार म्हणून कोल्हापूरच्या कोर्टात उपस्थित रहावं लागे किंवा कधी छोटे-मोठे ट्रेनिंग प्रोग्रॅमस्… कांही ना कांही कारण निघायचं आणि त्या त्या वेळच्या रुटीनचाच एक भाग म्हणून रिजनल-ऑफिसकडून मला बोलावणं यायचं आणि त्या निमित्ताने माझं पौर्णिमेचं दत्तदर्शन तर व्हायचंच शिवाय सगळे प्रवास खर्च आणि टीए डीए बँकेकडून मिळायचे.

खरंतर सहज घडलेल्या एका साध्या प्रसंगाच्या निमित्ताने सलग बारा वर्षांचा दीर्घकाळ दर पौर्णिमेला नृसिंहवाडीला नियमित दत्तदर्शनाला यायचा मी केलेला तो संकल्प! ‘आपल्याला या पौर्णिमेला जायला जमेल ना? काही अडचण येणार नाही ना?’अशी टोकाची साशंकता या बारा वर्षांच्या दीर्घकाळात मनात कधीच निर्माण झालेली नव्हती. या एवढ्या वर्षांमध्ये माझ्या आयुष्यात आणि ‘सर्विस लाइफ’ मधेही प्रचंड उलथापालथ आणि स्थित्यंतरं व्हायचे अनेक प्रसंग आले. पण त्यावेळीही मन कधीच साशंक झालेले नव्हते. या दरम्यानच्या काळात मला मिळत गेलेली सलग प्रमोशनस् मला प्रगतीपथावर नेत असायची. त्या प्रत्येकवेळी प्रमोशन मिळालेल्या सर्वांच्याच मनात सेंट्रल-आॅफीसची ‘प्रमोशन पोस्टिंग पॉलिसी’ काय ठरते याच्या उत्सुकतेइतकेच दडपणही असायचेच. या प्रत्येक प्रमोशनच्यावेळी असणारी अनिश्चितता काय किंवा एरवीही वेळोवेळी कधीही होऊ शकणाऱ्या माझ्या बदल्या काय, त्या प्रत्येकवेळी माझ्या संकल्पपूर्तीत अडथळे निर्माण होऊ शकलेही असते, पण आश्चर्य म्हणजे तसं कधीही झालं नाही!आज मागे वळून बघताना मला तीव्रतेने जाणवते की त्या त्या प्रत्येकवेळी ‘त्या’नेच मला अलगदपणे अनपेक्षित आधार दिला होता, सांभाळलं होतं आणि त्यानेच एक अदृश्य, अभेद्य असं ‘संरक्षक कवच’च माझ्याभोवती तयार करून ठेवलं होतं जसंकांही!अशा अनुभवांपैकी एखाददुसरा प्रातिनिधिक प्रसंग लिहिण्याच्या ओघात पुढे कधीतरी येईलही. अशा प्रसंगी अगदी अचानकपणे मिळालेल्या अकल्पित कलाटणीने थक्क झालेल्या माझ्या मनाला ‘माझी संकल्पपूर्ती हा माझ्याइतकाच त्याचाही आनंद असणाराय’ असा भारावून टाकणारा विचार मनाला स्पर्श करुन जात असे. आज त्या कल्पनेनेसुध्दा मन भरून येते!

महाबळेश्वरनंतर माझ्या झालेल्या बदल्या आणि नंतरच्या प्रमोशन्सनंतर झालेली पोस्टिंग्ज् यावरून नजर फिरवली तरी माधवनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी या ब्रॅंचेसमधला कार्यकाळ मला आपसूक आठवतो. प्रत्येकवेळी प्रमोशननंतरही मला एकाच रिजनमधे असा सलग बारा वर्षांचा काळ व्यतीत करायला मिळाला आणि तोही कुणाच्याही खास ओळखी आणि जवळीक न वाढवता हे आमच्या बँकेपुरता विचार केला तरी माझे एकमेव उदाहरण असावे.. !

पण या सगळ्या खूप नंतरच्या गोष्टी. महाबळेश्वपुरतं बोलायचं तर महाबळेश्वरला फॅमिली शिफ्ट होईपर्यंतचा साधारण वर्षभराचा काळ हा अशा अनेकविध अनुभवांमुळे मला दिलासा देत आला होता. हा एक वर्षाचा काळ आम्हा उभयतांच्या दृष्टीने खरंच कसोटी पहाणारा होता. इकडे माझ्या रुटीनमधे मला कराव्या लागणाऱ्या तडजोडींपेक्षाही काॅलेज, प्रॅक्टीकल्स, अभ्यास यांचं श्वास घ्यायलाही फुरसत नसणारं ओझं आणि जोडीला लहान मुलाची जबाबदारी यांचा विचार करता माझ्या बायकोने, आरतीने केलेल्या तडजोडी निश्चितच कणभर कां होईना अधिक कौतुकास्पद होत्या असंच मला वाटतं. कारण लग्नानंतर तिला सहज योगायोगाने मिळालेली राष्ट्रीयकृत बॅंकेतली नोकरी सलिलचा जन्म झाल्यानंतर तशीच परिस्थिती निर्माण झाली तेव्हा बालसंगोपनाला प्राधान्य देत कर्तव्यभावनेने तिने पूर्ण विचारांती सोडलेली होती. तिला शैक्षणिक क्षेत्राची आवड होती आणि सलिल थोडा सुटवांगा झाला की त्यादृष्टीने काहीतरी करण्याचे तिने ठरवलेही होते. त्यानुसार योगायोगाने याच वर्षी तिला कोल्हापूरच्या सरकारी बी. एड् कॉलेजमधे ऍडमिशनही मिळालेली होती. माझी महाबळेश्वरला बदली झाली ती या पार्श्वभूमीवर! या सगळ्याचा लिहिण्याच्या ओघात आत्ता संदर्भ आला तो तिच्या करिअरला आणि आमच्या संसारालाही विलक्षण कलाटणी देणाऱ्या आणि त्यासाठी माझी महाबळेश्वरला झालेली बदलीच आश्चर्यकारकरित्या निमित्त ठरलेल्या, सुखद असा चमत्कारच वाटावा अशा एका घटनेमुळे !

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “निर्भयाचे नाव काय ?” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? विविधा ?

☆ निर्भयाचे नाव काय ? ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

उत्सुकता सर्वच जीवांचे वैशिष्ट्य आहे. नाक नावाचा अवयव हा श्वास घेण्यास दिला गेला असला तरी खुपसण्यास जास्त वापरला जातो. आपले झाकून ठेवताना दुसऱ्याचे वाकून पाहण्यासाठी डोळे आहेतच. तोंड तर free to air वृत्तवाहिनी! बघ्यांचे डोळे म्हणजे सीसीटिव्ही… खरं तर शी!शी! टीव्ही!

जंगलात झाडांच्या फांद्या उभ्या कापण्याचे काम करीत असलेल्या कारागिरांचे काम एक माकड पहात होते… आणि ते लोक नेमकं काय करत आहेत? याची त्याला उत्सुकता होतीच. पण एवढ्यावरच त्याने थांबले पाहिजे होते. करवतीने फांदीच्या मध्ये काप घेत असताना जर कापणे मध्येच थांबवले तर करवत लाकडाच्या दाबाखाली येऊन अडकून बसते आणि मग ती निरुपयोगी ठरते. म्हणून ती काढून घेण्याआधी कापलेल्या भागाच्या आत लाकडाचा एक उभट तुकडा ठेवला जातो.. त्याला पाचर म्हणतात! कारागीर जेवण करण्यास निघून जाताना त्यांनी ही पाचर नीट मारली होती… पण ती काढली तर काय होईल? हा प्रश्न माकडाला सतावत होता. त्याने ती पाचर काढण्याचा प्रयत्न केला.. ती निघालीही… पण त्याची शेपटी कापलेल्या झाडाच्या मध्ये अडकली… आणि मग कारागिरांनी माकडास बेदम झोडपून काढले! ही गोष्ट तशी लोकांच्या माहितीची आहे!

गोष्ट राहू द्या… कारण ते तर माकड होते! पण माणसांना कायदा ठावूक नसावा हे फार झाले! 

एकतर हल्ली फेसबुक हे बातमीपत्र बनले आहे. स्वयंघोषित बातमीदार बऱ्याच लोकांना आधीच माहीत झालेल्या सबसे तेज बातम्या सांगण्या, दाखवण्यात धन्यता मानतात!

कोलकाता येथील महिला डॉक्टरवर आलेला प्रसंग शत्रूवर ही येऊ नये. मुळात बलात्कार हा खुनापेक्षाही गंभीर गुन्हा आहे. यात पीडित व्यक्ती सर्वाधिक त्रास सहन करते. त्यामागे आपली सामाजिक मानसिकता मोठी भूमिका बजावते. गुन्हेगार उजळ तोंडाने आणि पीडित तोंड झाकून फिरतात.. असे दृश्य आहे. उपचार म्हणून पोलिस गुन्हेगारांची थोबाडं पिशव्यांनी झाकण्याचा प्रयत्न करतात हे ही खरे. पण ते चेहरे लोकांनी आधीच पाहून ठेवलेले आणि कॅमेऱ्यात कैद करून ठेवलेले असतात. पण हे चेहरे झाकण्यामागे न्यायालयीन प्रक्रियेतला एक महत्वाचा उद्देश दडलेला असतो.

बलात्कार, लैंगिक अत्याचार सारख्या खटल्यातील सुनावण्या in camera अर्थात अतिशय मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत घेतल्या जातात. पण हल्ली लोकांना सर्वच on camera पाहिजे असते! अपघात, हल्ले, आत्महत्या यांत dead झालेल्या लोकांची live चलतचित्रे जास्त पसंत केली जातात. यात खूप पैसे मिळत असल्याने हे प्रदर्शन विशेष लक्ष देऊन केले जाते!

एका तथाकथित शैक्षणिक चित्रपटात बलात्कार शब्दाच्या मदतीने विनोद निर्मितीचा चमत्कार खूप गाजला. पण तो चित्रपट गाजत असताना आणि आजवरही त्यातील बलात्कार – चमत्कार शब्दाच्या वापराबाबत, त्याच्या दुष्परिणामांबाबत कसे कुणाला काही वाटले नाही, याचे आश्चर्य वाटते! लहान मुले या दृश्याचा आनंद घेत असताना पाहणं ही खूप दुःखाची बाब म्हणावी लागेल!

खूप काम पडल्यावर एका सुमार अभिनेत्याने मला माझ्यावर सामूहिक बलात्कार झाल्यासारखे वाटते! अशी प्रतिक्रिया देणे सुद्धा अनेकांच्या कानांतून सुटून गेले! अनेक चित्रपटात बलात्काराच्या प्रसंगात उत्तम अभिनय करणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्याने सुद्धा ” मी आताच दोन बलात्कार करून आलो.. असे वाक्य फेकून मित्रमंडळींना हसवले होते, असे ऐकिवात आहे. यातून बलात्कार शब्दास एक सहजपणा प्राप्त होत जातो, हे समाजाच्या मानसास कधी समजेल? …. हाच समाज The Rape of the lock नावाच्या इंग्रजी नाटकाच्या मुखपृष्ठावरील rape हा शब्द वाचून तुमच्याकडे तुम्ही अश्लील वाचता आहात, अशा नजरेने पाहू शकतो! असो.

बलात्कार पीडितेचे नाव, छायाचित्र इत्यादी माहिती प्रसिद्ध करू नये, असा न्यायालयाचा आदेश असताना काही अज्ञानी लोक नेमके असेच का करत सुटलेत? हा कायदेभंग केल्यास तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे, याचे अज्ञान हा बचाव ठरणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यापेक्षाही सदर पीडित आपलीच कुणी सख्खी असती तर आपण अशी प्रसिद्धी दिली असती का? हाही विचार व्हावा! उलट कायद्याच्या तरतुदींना अधीन राहून गुन्हेगारांच्या कृत्यांना, अर्थात त्यांची भलावण होणार नाही अशा पद्धतीने प्रसिद्धी देण्याचं जमते का ते पाहावे! यात मग.. त्याचा गुन्हा कुठे सिद्ध झालाय अजून? असे cross जाण्याची गरज नाही!

जिचा काहीच गुन्हा नाही तिला जिवंतपणी आणि मरणानंतर शिक्षा का देता?

आणि माननीय न्यायालयाने याबाबतीत वेळोवेळी तसा आदेश दिलेला असतानाही लोकांनी असेच वागावे, याला काही अर्थ?

काही वर्षांपूर्वी एक मोठी अभिनेत्री इमारतीवरून पडून गतप्राण झाली होती.. त्यात तिचे शरीर अनावृत होते… ते ‘ पाहण्या ‘ साठी मुंबईमध्ये हजारो लोक जमले होते! 

काय झाकून ठेवायचे आणि काय वाकून बघायचे यातील विवेक कुणी कुणाला शिकवावा? हाच प्रश्न आहे!

बाकी एक महिला जिवानिशी गेली… तिच्या प्रकरणात कोलकात्यात जो हैदोस सुरू आहे.. ते पाहून डोळे, कान आणि मनाचे दरवाजे बंद करून बसावे, असे वाटते!

… ती मेली आणि तिला मारणारे अजून काही वर्षे जगणार आहेत, व्यवस्था त्यांना जगवणार आहे हे चित्र भयावह आहे.. की हेच आपले प्राक्तन आहे, न कळे!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘पिठोरी अमावस्या अर्थात वैश्विक ‘मातृत्व’ दिन‘☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ पिठोरी अमावस्या अर्थात वैश्विक ‘मातृत्व’ दिन… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

आज श्रावण अमावस्या !! बैलपोळा, पिठोरी अमावस्या आणि मातृदिन असा त्रिवेणी संगम असलेला पावन दिवस !!!

अशी कथा सांगितली जाते की एकदा भगवान शंकर आणि माता पार्वती द्यूत खेळत होते. पंच (परीक्षक) म्हणून नंदी महाराज होते. खेळात माता पार्वती जिंकल्या होत्या. पण पंचाने म्हणजे नंदीने भगवान शंकर जिंकले असे जाहीर केले. याचा पार्वतीमातेला राग आला व तिने नंदीला शाप दिला की तुझ्या मानेवर लोकं जोखड ठेवतील आणि तुझा उपयोग शेतीच्या कामासाठी व इतर कामासाठी केला जाईल. नंतर नंदीने क्षमा मागितली तेव्हा पार्वतीमातेने त्याला वरदान दिले की श्रावण अमावस्येच्या दिवशी तुला काहीही काम सांगणार नाहीत, तुझी पूजा केली जाईल, तुला गोडधोड खाऊ घातले जाईल, तुझे कौतुक केले जाईल आणि तेव्हापासून आपल्याकडे ‘बैलपोळा’ हा सण साजरा करण्यात येतो. आपल्या संस्कृतीप्रमाणे घरात अगदी नवीन संगणक आणला तरी त्याची पूजा केल्याशिवाय आपण तो सुरु करत नाही, अशा निर्जीव वस्तूंचीही पूजा होते, तिथे जन्म देणाऱ्या मातेला ही संस्कृती कशी विसरेल? माता, जननी, मातृभूमी आणि जमिनीतून धान्य पिकायला सहाय्यकारी ठरणाऱ्या बैलाचीही आपल्याकडे पूजा होणे क्रमप्राप्त नव्हे काय?

या दिवशी बैलांना विश्रांती द्यायची. त्यांना ऊन पाण्याने आंघोळ घालायची, पुरणावरणाचा स्वयंपाक करून आधी त्याचे तोंड गोड करायचं. खूप ठिकाणी ‘ “शिंगे रंगविली, बाशिंगे बांधिली, चढविल्या झुली ऐनेदार ‘ असाही बैलपोळ्याचा थाट उडवून देतात. बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक गावात बैलपोळा सामूहिकरीत्या साजरा केला जातो.

श्रावण अमावास्येला ‘पिठोरी अमावास्या’ असेही म्हणतात. ज्यांची मुले जगत नाहीत, अशा स्त्रिया पिठोरीचे व्रत करतात. हे व्रत पूजाप्रधान असून, चौसष्ट योगिनी या त्याच्या देवता आहेत. या व्रताचे विधान असे – श्रावण अमावास्येच्या दिवशी दिवसभर उपोषण करावे. सायंकाळी स्नान करून सर्वतोभद्र मंडलावर आठ कलश स्थापावे. त्यावर पूर्णपात्रे ठेवून त्यांत ब्राह्मी, माहेश्‍वरी, इ. शक्तींच्या मूर्ती स्थापाव्या. तांदुळाच्या राशीवर चौसष्ट सुपार्‍या मांडून त्यावर चौसष्ट योगिनीचे आवाहन करावे. त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. नंतर व्रतासाठी केलेले पक्वान्न डोक्यावर घेऊन ‘कोणी अतिथी आहे काय? असा प्रश्न विचारावा. मुलांनी ‘मी आहे’ असे म्हणून ते पक्वान्न मागच्या बाजूने काढून घ्यावे.

पूर्वी पूजेच्या मूर्ती पिठाच्या करीत. अलिकडे त्यांची छापील चित्रे मिळतात. या व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करतात. त्यावरून या तिथीला पिठोरी अमावास्या असे नाव पडले असावे. पूर्वी घराघरात ‘पिठोरी’ची पूजा होत असे. पिठोरी अमावस्येचंच दुसरं नाव मातृ दिन. या दिवशी महिला उपवास करतात. सायंकाळी स्नान करून घरातल्या मुलाला किंवा मुलीला खीरपुरीचे जेवण देतात. या दिवशी ६४ योगिनींच्या चित्राची महिला पूजा करतात. पुरणपोळी खांद्यावरून मागे नेत ‘अतीत कोण?’ असा प्रश्न विचारायचा असतो. त्याचे उत्तर म्हणून आपल्या मुलाचे नाव घ्यायचे. म्हणजे पुत्र किंवा कन्या दीर्घायुषी होतात, अशी श्रद्धा आहे. घरातली कर्ती स्त्री डोक्यावर ‘पिठोरी’चं वाण घेऊन ‘माझ्यामागे कोण आहे?, चा घोष करत असे. घरातील मुलं तिला ‘मीच, मीच’ म्हणत प्रतिसाद दिला जात असत. बेदाणे घातलेली भाताची खीर हा ‘पिठोरी’चा खास नैवेद्य.

मुलांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी पिठोरी अमावस्येचे व्रत करण्याची प्रथा आहे. या सणामागची पौराणिक कथा अशी आहे की विदेहा नावाच्या स्त्रीला दर श्रावण अमावास्येला मुले होत व ती लगेच मृत्युमुखी पडत. या कारणासाठी पतीने तिला घराबाहेर हाकलून दिले. तेव्हा तिने कठोर तपश्चर्या केली. प्रसन्न होऊन चौसष्ट देवतांनी तिला दर्शन दिले. पुढे ती पुन्हा घरी आली. विदेहावर प्रसन्न झालेल्या देवतांच्या कृपेमुळे तिला दीर्घायुषी असे आठ पुत्र झाले. अशा प्रकारे संतति रक्षणासाठी चौसष्ट देवतांच्या पूजनाबरोबरच स्त्रीला स्वत:च्या सामर्थ्याची व मर्यादाशीलतेची जाणीव पिठोरी अमावास्या करून देते. म्हणून ही अमावास्या महत्वाची आहे. आजच्या पावन दिनी दिवशी वंशवृद्धीकरिताही पूजा केली जाते. म्हणून यास ‘मातृदिन’ असेही म्हणतात. पण आज याला आणखी एक संदर्भ जोडला तर आणखी सयुक्तिक होईल असे वाटते. आपण आजच्या दिवसाला ‘मातृत्वदिन’ म्हणू शकतो. ‘माता’ होणे हे जन्म देण्याशी निगडित आहे तर मातृत्वभाव हा फक्त जन्म देण्याशी निगडीत नाही. हा तर वैश्विक भाव आहे. आजची सामाजिक परिस्थिती लक्षात घेतली तर समाजाला आज ‘मातृत्वभावा’ची विशेषत्वाने गरज आहे असे जाणवते.

‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’, ‘आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही’; ‘प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधु आई’ अशा विविधप्रकारे प्रतिभावंत कवींनी/मुलांनी आपल्या आईचे गुणवर्णन केले आहे. जरी असे वर्णन जरी केले असले तरी ते वर्णन पूर्ण आहे असे कोणताच कवी ठामपणे म्हणू शकत नाही. ज्या प्रमाणे भगवंताचे वर्णन करता करता वेद हि ‘नेति नेति’ असे म्हणाले, (वर्णन करणे शक्य नाही), अगदी तसेच आईच्या बाबतीत प्रत्येक मुलाचे / प्रतिभावान कवीचे होत असावे असे वाटते आणि म्हणूनच आपल्या हिंदू संस्कृतीत पहिला नमस्कार आईला करण्याचा प्रघात रुजवला गेला असावा.

आपल्या संस्कृतीत प्रत्येक गोष्टीकडे ‘मातृत्वभावाने पाहण्याचे संस्कार आपल्यावर बालपणीच केले जात असतात, त्यामुळे आपल्याकडे पूर्वीपासून ‘भूमाता’, ‘गोमाता’, ‘भारतमाता’ अशा विविध भावपूर्ण संज्ञा आपल्या मनावर कोरल्या गेल्या आहेत. ही पद्धत अकृत्रिम पद्धतीने आचरली जात होती, त्यामुळे ‘राष्ट्रीय एकात्मता’ शिकवावी लागत नव्हती की त्याची जाहिरात करावी लागत नव्हती. मनी रुजवलेल्या मातृत्वाभावामुळे कितीतरी चांगल्या गोष्टी नकळत घडत होत्या आणि त्याचा फायदा सर्व समाजाला, पर्यायाने देशाला होत होता. आज पुन्हा एकदा आईचे ‘आईपण’ (प्रत्येक गोष्टीतील मातृत्वभाव) जागृत करण्याची गरज जाणवत आहे. “छत्रपती शिवाजी शेजारणीच्या पोटी जन्माला यावा’ ही मानसीकता सोडून ‘मीच माझ्या बाळाची ‘जिजामाता’ होईन” हा विचार मातृशक्तीत रुजविण्याची गरज आहे असे जाणवते. भले मला माझ्या मुलास ‘शिवाजी’ बनवता आले नाही तर त्याला शिवरायांचा ‘मावळा’ बनवण्याचा प्रयत्न मी नक्की करेन करेन असा पण प्रत्येक आईने करायला हवा. हा प्रयत्न थोड्या प्रमाणात जरी यशस्वी झाला तरी देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रणाम मोठ्या प्रमाणात कमी होतील.

आज ‘आंतरराष्ट्रीय मातृत्वदिन’ आहे. आपल्या आईप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. मला असा जाणवलं की नुसती कृतज्ञता व्यक्त करून आपले कर्तव्य संपेल ? नक्कीच नाही. तर एक मुलगा म्हणून माझं काही कर्तव्य नक्कीच आहे. मी माझ्या जन्मदात्रीचा मुलगा आहेच, भारतमातेचे पुत्र आहे, समाजपुरुषाचा पुत्र आहे. प्रत्येकासाठी माझी वेगवेगळी कर्तव्ये आहेत, ती योग्य रीतीने पार पाडता यावीत म्हणून मी माझ्या जीवनात प्राधान्यक्रम कशाला देणार हे ठरवावयास हवे. माझ्या अंगातील कौशल्ये अधिकाधिक समाजाभिमुख कशी होतील याचा विचार करावयास हवा. ‘मी आणि माझे’ यातून बाहेर पडून संपूर्ण समाज ‘माझा’ आहे ही भावना बळकट व्हावयास हवी. आज त्याचीच नितांत गरज आपल्या मातृभूमीस आहे, असे वाटते.

जसे भक्तामुळे देवास ‘देवपण’, अगदी तसेच लेकरांमुळे आईला ‘आईपण’ प्राप्त होते. भक्तच आपल्या भक्तीतून देवाचे देवपण सिद्ध करतो, तसेच प्रत्येकाने यथाशक्ती चांगले वागून, चांगली कर्म करून आपल्या आईच्या आईपणास गौरव प्राप्त करून दिला पाहिजे. मग ती आई असो, गोमाता असो कि भारतमाता !!. दैनंदिन व्यवहार करताना आपल्या अंगी ‘मातृभाव किंवा पुत्रभाव’ ठेवता आला तर देशातील भ्रष्टाचार, सामाजिक भेदभाव आणि इतर सर्व अनैतिक गोष्टी तात्काळ बंद होतील, यात बिल्कुल संदेह नाही.

आज आईचे स्मरण करताना बऱ्याच गोष्टी चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोरून सरकत गेल्या. माझी आई ही एखादवेळेस जिजामाता नसेल, ‘श्यामची आई’ नसेल पण ती ‘आई’ होती हेच माझ्यासाठी पुरेसे होते. आज या नश्वरजगात आई नाही, पण तिने जे काही शिकविले ते ‘श्यामच्या आई’च्या शिकवणीपेक्षा कणभरही कमी म्हणता येणार नाही. ‘देवाला सर्व ठिकाणी जाता येत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली’* याची अनुभूती आपण सर्वच जण नेहमीच घेत असतो. सर्व संत मातृभक्त होते. सर्व क्रांतिकारक मातृभक्त होते आणि म्हणूनच अनंत हालअपेष्टा सोसूनही क्रांतीकारकांनी स्वराज्य प्राप्तीसाठी अथक प्रयत्न केले. आपणही आपल्या आईसाठी यथामती काहीतरी करीतच असतो. आपल्या आईची समाजातील ‘ओळख’ ‘सौ. अमुक अमुक न राहता ती अमुक अमुक मुलाची आई आहे’, अशी करून देता आली तर आईप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा यापेक्षा चांगला उपाय नसेल..

मी इथे प्रत्येकाच्या मनात असलेली ‘आई’बद्दलची भावना प्रातिनिधिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चुकभुल माफी असावी.

चार मातीच्या भिंती

त्यात राहे माझी आई

एवढे पुरेसे होई

घरासाठी….. !!

जगातल्या सर्व मातांस आणि मातृभावनेने कार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांस ही शब्दसुमनांजली सादर अर्पण!! श्रीरामसमर्थ।

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अलौकिकाच्या पालखीबरोबर… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर ☆

सुश्री सुलभा तेरणीकर

🔅 विविधा 🔅

☆ अलौकिकाच्या पालखीबरोबर… ☆ श्री सुलभा तेरणीकर

शाळा सुटली तेव्हा पाठ्यपुस्तकातल्या कवितांचा निरोप घेताना कविताशाखेची एक मुळी बरोबर घेतली होती. पुढे महाविद्यालयाच्या प्रांगणात ती चांगलीच बहरली. साहित्याची विद्यार्थिनी नसूनदेखील कवितेचे प्रेम अखंड राहिले. इंदिरा संत, महानोर, ग्रेस, आरती प्रभू, पाडगावकर यांच्या कवितांनी दिवस नुसते घमघमत होते. 

ग्रंथालयाच्या प्रतीक्षायादीसाठी किती अधीर असायचे मन ! संग्रह पटकन हाती पडायचे नाहीत. मग उधार-उसनवारी, मिनतवारी करावी लागे. कविता क्वचित कानी पडत आणि पुन्हा वाट पाहणे संपत नसे. 

‘गडद नीलिमा चष्म्यावरचा, शर्टावरची बटणे काळी’… इंदिरा संतांच्या कवितेतल्या इंद्रधनूवर रेलणारी सुरंगा आपणच आहोत, असा भास होई, ‘तो चहा गुलाबी, ती चर्या खळाळणारी…’ असे काही वाचताना धूसर स्वप्नांची वाट आता दूर नाही, असे वाटे. आरती प्रभूंच्या ‘माझी वस्त्रं तुझी झाली’ या ओळींवर पतंग होऊन मन झेपावत असे. पाडगावकरांची ‘जांभळी नीज ये’ रेंगाळत राही. बोरकरांची ‘पाठमोरी पौर्णिमा’ शोधून वाचली जाई. 

‘पाठमोरी तू बीजेची रात्र, लावण्ये रमा हासुनी पाही वळोनी,

होऊ दे ना पौर्णिमा…’

दुर्बोधतेच्या घनवनाची तमा न बाळगता ग्रेसच्या कविता शोधायची अनिवार हौस फिटतच नसे. 

‘शून्यात गर्गरे झाड तशी ओढाळ  दिव्यांची नगरी 

वक्षात तिथीचा चांद तुझा की वैरी … ‘

…. या ओळींवर फिरफिरून नजर जात असे. महानोरांच्या रानाने तर साद घातलेली होती. राजबन्सी पाखराने खुणावले होते. हिंदी-मराठी चित्रपटगीतांतून, भावगीतांतून कविता भोवती रोषणाई करीत असे. गदिमांच्या गाण्यातले कडवे मनात अधोरेखित करीत असे. 

‘प्रिय नयनातील भाव वाचता 

चुकून दिसावा मोर नाचता 

दूर देशीचे बुलबुल यावे कधीमधी पाहुणे… ‘

… त्यातले छंद-प्रास आवडत, की शब्दांतून साकारणाऱ्या दृश्यांचा मोह अनावर होई, की नाद ओढ लावीत;ते कळायचे नाही. आपल्या कोवळ्या तारुण्याची जादू असावी, की काय, असेही वाटे. मग आपणही कविता कराव्यात, असे वाटे. जमिनीवर पाय काही ठरायचे नाहीत. 

त्यातच पुढे साहिरचे ‘तल्खियॉं’ हाती आले. त्यातल्या दाहकतेने चटका लावला. 

‘तेरे पैराहने रंगोंकी जुनूखेज़ महक 

ख्वाब बन बनके मेरे ज़हन में लहराती है ,

रात की सर्द  खामोशी में हर इक झोंके से 

तेरे अनफ़ास, तेरे जिस्म की ऑंच आती है

‘तुझ्या रंगीत वसनांचा उन्मादक गंध एखाद्या स्वप्नासारखा तरळतो. रात्रीच्या नि:शब्दतेत थंड झुळकीबरोबर तुझ्या श्वासांची, शरीराची दाहकता जाणवतीय.’ 

असे काही वाचल्यावर माझ्या सुसंस्कृत मनाच्या भिंती थरथरल्या. इंदिरा संतांच्या कवितेतल्या मणिबंधावर उतरणाऱ्या खुळ्या  पाखरासारखी मी धडधडत राहिले. 

आता पुढची कथा सांगायला हवी. मोठ्या वादळात कवितांची घरटी पार उध्वस्त झाली. छंद हरवले. शब्द निमाले. आवडीच्या कवितांचा संग्रह जवळ असावा, हे विलासी स्वप्न दूर-दूर जात राहिले. आकडेमोड, खर्चाची तोंडमिळवणी, देणी-घेणी, दुखणीबाणी यात किती चंद्र-सूर्याचे उदयास्त होऊन गेले, ते कळले नाही. बधिरपणातून सावरेपर्यंत बरीच चढण चढले. एखाद्या शांत पांथस्थाने झाडाखाली क्षणभर बसावे, तशी थोडी थांबले आणि कवितेची सृष्टी पुन्हा एकदा जवळ केली. जमेल तसे एकेक कवितासंग्रह घरी आणत गेले. रात्री उशागती दिव्याच्या सोबतीने कवितांची उजळणी करू लागले. सरत्या चैत्राच्या उत्तररात्री असते, तशी नक्षत्रांची आरास कुठली असायला? मंद दिव्याची सोबत पुरत असे. कळ्या-फुलांचे बहर नव्हते. वाळलेल्या काटक्यांच्या समिधा मात्र होत्या. 

स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पिढीतली असल्याने कुसुमाग्रजांच्या क्रांतिघोषाच्या जयजयकारापासून, धगधगत्या यज्ञज्वाळेपासून दूर चालत आले होते खरी; पण आता त्यांची कविता माझ्यापाशी होती. 

‘नवरत्नांनी जडवलेले अलंकार अंगावरून उतरवीत ती माझ्यासमोर उभी राहिली… आणि अखेर देहाला बिलगलेलं झिरमिर आवरणही तिनं दूर फेकून दिलं…

निरभ्र सोलीव रूपाकडे पहात कवीनं विचारलं-

‘तू कोण?’

ती हसून उद्गारली – ‘मीच ती तुझी कविता !’

अखंड पाषाणातल्या सावळ्या मूर्तीसारखी कवीची कविता माझी झाली. वृत्तछंदाचे अलंकरण आता उरले नव्हते. प्रासाची पैंजणे नव्हती … ‘निशिगंध’ वाचत गेले. 

‘आणि अंतराळातील कृष्णविवरासारख्या असीम शून्यावस्थेत 

माझ्या असलेपणाची आरास..’

 …. असलेपणाची आरास? अवघ्या विश्वातले आपले चिमुकले अस्तित्व हाच उत्सव, तर मग जीवन हा तर नित्य आनंद सोहळा… माझ्या प्रौढपणीच्या पाठयपुस्तकातले पान  मोहरून उठले. व्यक्तिगत सुखदु:खाच्या संदर्भातले कवितेचे भान वैश्विक स्तरावर उंचावले गेले. त्याच्या पाऊलखुणा शोधत राहिले… 

‘विसरल्या उन्हातिल वाटा, विसरले पथातील काटे 

ही गुहा भयावह आता स्वप्नांसम  सुंदर वाटे

रसभाव भराला आले काव्याहून लोभसवाणे’

…. गदिमांच्या सहज सुचलेल्या मंजुळ गाण्याने काहीतरी सांगितले. बोरकरांची ही कवितादेखील काही कुजबुजून गेली….  

‘येते उदासता कधी ओल्या काळोखासारखी,

मध्यरात्री तिची पण फुले नक्षत्रपालवी…’

… दिवा मंद तेवताना ही रोषणाई कसली अन भोवती हा कोलाहल कसला? तो तुमच्या-आमच्या ‘असण्याचा’ सोहळा आहे. कवितेच्या अलौकिकतेच्या पालखीबरोबर दोन पावले चालायचे आहे ना… सर्वांच्यासह…

©  सुश्री सुलभा तेरणीकर

मो. 8007853288 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “कृष्ण स्वरूप…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “कृष्ण स्वरूप…” ☆ सौ राधिका भांडारकर 

खरं म्हणजे रामायण महाभारतातल्या कथा ऐकतच आम्ही लहानपणी रमलो. रामायणातला राम आणि महाभारतातला कृष्ण या दोन्ही व्यक्तिरेखा तेव्हापासूनच मनावर ठसलेल्या पण या दोन्ही व्यक्तींचा प्रभाव मात्र भिन्न होता— भिन्न आहे. राम म्हणजे एकनिष्ठ, एकपत्नीव्रती, प्रजाहितदक्ष, एकवचनी, पितृवचनी, माता बंधुप्रेमी असा आदर्शवादी म्हणून मनात रुजला. कृष्णामध्ये मात्र निराळीच भावनिक गुंतवणूक झाली. रामात आणि आपल्यात एक पारलौकिक अंतर जाणवलं. कृष्ण मात्र अगदी जवळचा सवंगडी, सखा, जिवलग झाला म्हणूनच बालपणीचा कृष्ण आणि त्याच्या खोड्या, मिस्कीलपणा सांगणाऱ्या कथेत मनापासून रमलो. आजही मनाला भावतो तो नटखट कन्हैया. यशोदेचा कान्हा. यमुनेच्या प्रवाहात कालियाच्या मस्तकावर नाचणारा कृष्ण, गवळणींची मटकी फोडणारा मिस्कील नंदलाल, टांगलेल्या हंडीतलं लोणी मित्रांसोबत चोरून खाणारा तो लबाड माखनचोर, रंग उडवणारा, रास खेळणारा, गोपींची वस्त्रे लपवणारा खोडकर पण तरीही प्रिय असा हा गोकुळवासी गोपीनंदन. कुंजवनात कदंब वृक्षातली, पाय दुमडून मंजुळ बासरी वाजवणारा, शामल वर्णी, शिरी मोरपीसधारी, राधेच्या सहवासातला दंग मुरारी. गाई राखणारा, आणि गोरक्षणार्थ पर्वत उचलणारा गोवर्धनधारी, वसुदेवसुत, देवकीनंदन, यशोदेचा कान्हा मनात कायमचं वास्तव्य करून राहिला.

बोबडा पेंद्या आणि कृष्णाची मैत्री तर फारच रंजक. अविस्मरणीय.

पेंद्या रुसलाय. दुखावलाय. म्हणतो कसा,

“कुत्ना थमाल ले थमाल आपल्या गाई आम्ही आपल्या घलाशी जातो भाई ।

कृष्ण मित्र म्हणून भोळा पेंद्या त्याच्याजवळ तक्रार करतो,

काल बलाचि ले बलाचि खलवस केला 

तुम्ही सल्वांनी फाल फाल घेतला

मी गलीब म्हणुनी थोलका दिला

तू म्हणशील ले याला कलतीच नाही ।

कृष्ण हा आपला सखा आहे आणि तो आपलं गार्‍हाणं, आपलं रागावणं, आपलं दुःख जाणून घेईलच याची पेंद्याला किती खात्री! म्हणूनच खऱ्या मित्राची खरी प्रतिमा कृष्णाच्या रूपातच मनावर ठसते.

जसा पेंद्या तसाच सुदामा. राजमहालातल्या पंचपक्वांनाना डावलून, फडक्यात बांधून आणलेल्या सुदामाच्या मूठभर पोह्यांचा तो मनापासून चट्टामट्टा करतो. या साऱ्याच कथांमधला कृष्णस्पर्श मनात अमरत्वाच्या भावनेनं बिलगलेला आहे…

देवाचा देव बाई ठकडा

एका पायाने लंगडा 

करी दही दुधाचा रबडा… असा हा मनात बसलेला लडीवाळ कान्हा, अचल असला तरी जसं वय वाढत गेलं, तसं महाभारतातला, अर्जुनाला गीतामृत पाजणारा, पार्थसारर्थी, हाती शस्त्र न धरता चार युक्तीच्या गोष्टी सांगणारा राजनीतीज्ञ, धर्मपरायण, धूर्त, धोरणी, युगंधर हळूहळू उलगडायला लागला. गोकुळातून, मथुरा, द्वारका आणि हस्तीनापुरातला कौरव पांडव यांच्यात समन्वय घडून आणण्यासाठी प्रयत्नशील पण त्यानंतर केवळ सत्य धर्माची बाजू सांभाळणारा, रथारुढ भगवान श्रीकृष्ण आणि भीष्मप्रतिज्ञेला आव्हान देत पितामह भीष्मांशी संवाद साधणाऱ्या कृष्णाची अध्यात्मिक प्रतिमा मनात साकारू लागली. त्या प्रतिमेपर्यंत पोहचणं ही एक तपस्या आहे हेही जाणवू लागलं.

बालपणीचा राधेत रमणारा, गोपींची वस्त्र पळवणारा कृष्ण एका निराळ्याच तत्त्वात दिसू लागला. रूपकात्मक भासू लागला. अंगावरची वस्त्रे ऐहिकतेच्या रूपकात पाहता आली. ती कृष्णभक्तीने पळवली गेली म्हणजेच देह परमात्मा स्वरूप झाला. हा भक्तीयोग असा कळू लागला. राधाकृष्ण प्रेमाचं स्वरूप भक्ती आणि प्रीतीच्या उदात्त अद्वैतात जाणवलं. ते अशरीरी, अंत:प्रवाहातलं प्रीतीचं अमर स्वरूप होतं. हा कृष्ण खूप वेगळा होता. तो सगुण होता, आकृतीबंधातला होता पण तरीही आकलनाच्या पलीकडला होता.

कुब्जेच्या कुबडाला त्याचा दिव्य स्पर्श होतो, एका चिंधीच्या बदल्यात बंधू, सख्याच्या नात्याने भर दरबारात लज्जित झालेल्या द्रौपदीला सहस्त्र वस्त्रे पुरवून तिची लाज राखतो, सत्यभामेच्या हट्टासाठी इंद्रदेवाशी युद्ध करून स्वर्गातून पारिजातकाचा वृक्ष पृथ्वीवर आणतो पण त्याचवेळी रुक्मिणीच्या “मला ती सुगंधी प्राजक्त फुले आणून द्या” या लडिवाळ हट्टाचाही मान राखून “बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी” अशी कमाल त्या दोघींच्या जीवनात घडवून आणतो, सोळा सहस्त्र स्त्रियांचा पती म्हणून मिरवतो असा हा स्त्रियांचा कैवारी माझ्या स्त्री मनावर एक रक्षक म्हणून भक्तिभावाने राज्य करतो.

रणभूमीवर कर्णाच्या रथाचे चाक भूमीत रुतले. कर्ण चाक काढण्यासाठी रथाखाली उतरला. धनुष्यबाण ठेवल्यामुळे तो नि:शस्त्र होता. कृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने त्याच्यावर बाणांचा वर्षाव सुरू केला असताना कर्ण म्हणतो अर्जुनाला, ” हे धर्मयुद्ध आहे. हाती शस्त्र नसलेल्या शत्रूवर घाव घालणे हा अधर्म आहे. ”

तेव्हा कृष्ण उत्तरतो,

“हे राधासुता! तेव्हा कोठे गेला होता तुझा धर्म ज्यावेळी द्रौपदीच्या पदराला भर सभेत हात घातला जात होता, एकट्या अभिमन्यूला चक्रव्यूहात कौरवांनी घेरले?”

एकाच वेळी धर्मपरायण आणि जशास तसे कृतीतून उत्तर देणारा कृष्ण, पृथ्वीतलावरच्या प्रत्येक पापभीरू मानवासाठी आधारभूत ठरतो. कणखरपणे प्रत्युत्तर देणारा हा महाभारतातला कृष्ण, मनातल्या देव्हाऱ्यात भगवंत म्हणून स्थित होतो आणि नकळत बालपणीचा खोडकर कन्हैया याच तत्वाशी अलगद जोडला जातो.

अशा या मनातल्या गाभार्‍यात जपलेल्या कृष्णाला मात्र सभोवतालच्या नकारात्मक आणि अनीतीत बुडालेल्या, धर्मसंज्ञेचा धिक्कार झालेल्या, विकृत समाजात भयग्रस्त होऊन जगताना एक प्रश्न विचारावासा वाटतो,

“संभवामी युगे युगे” म्हणून आश्वासन देणारा तू कुठे आहेस? तू कसा लोपलास? का दिसत नाहीस? का जाणवत नाहीस? जर तू विश्वाच्या अंशा अंशात सामावलेला आहेस मग तू प्रकट का होत नाहीस? विठ्ठलाच्या रूपात तू जनीची लुगडी धुतलीस, दळण दळलेस, गोऱ्या कुंभाराची मडकी भाजलीस मग आत्ताच कुठे दडी मारून बसला आहेस? असं तर नाही ना की आम्हीच करंटे तुला पाहू शकत नाही. कृष्णस्वरूपांशी आमचीच समर्पण भावना कमी पडत आहे का?माझ्यात मीरा नाही. माझ्यात राधा नाही. मग हे मीराके प्रभु! सांग मला माझे भरकटलेले तारू तुझ्याविना किनारी कसं लागेल?”

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘मनाच्या लहरी‘☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ मनाच्या लहरी… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

मनाच्या लहरी की लहरी मन !!!

अर्थात वरील विषय वाचल्या वाचल्या आपल्या मनात देखील असाच विचार आला असेल. हो न ? अहो, साहजिकच आहे. कळायला लागल्यापासूनची मनुष्याला असलेली मनाची सोबत मनुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत कायम असते.

मन कसं असतं ? याची विविध उत्तरे देता येतील. आणि ही सर्व उत्तरे जरी खरी असली तरी मोठी गमतीशीर आहेत. कोणी त्याला चंचल म्हणेल, कोणी अचपल म्हणेल. कोणी अधीर म्हणेल तर कोणी बधिर म्हणेल. कोणी मनाला धीट म्हणेल तर कोणी सैराट म्हणेल. इतकं सार वर्णन केलं तरी कोणीही मनाचे इत्यंभूत वर्णन केले आहे असे छातीठोक पणे सांगू शकत नाही. कारण समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्या प्रमाणे आपले मन कसे आहे ? तर

“अचपळ मन माझे नावरे आवरीता’

आपले मन हे समुद्रासारखे विशाल असते, अथांग असते. कधी कधी तर स्वतःला देखील आपल्या मनाचा थांगपत्ता लागत नाही. एकाच वेळेला मन हे खंबीरही असते आणि तितकेच नाजूकही असते. ज्या प्रमाणे समुद्राच्या लाटांमध्ये फेस असतो, वाळू असते आणि लाटांबरोबर वाहून येणारे ओंडके सुद्धा असतात. अर्थात या ओंडक्याचा समुद्राच्या स्वाभाविक गती-प्रगती मध्ये फारसा फरक पडत नाही. पण मनुष्याच्या बाबतीत बरेच वेळा उलट घडते. कारण मनुष्याला आपले मन सागरा इतके विशाल करणे जमतेच असे नाही. ज्याप्रमाणे शरीराचे स्नायू मजबूत होण्यासाठी किंवा योग्य त्या प्रमाणात ताणण्यासाठी व्यायामाची गरज असते, अगदी त्याचप्रमाणे मनाचे व्यायाम करणारा मनुष्य आपले मन योग्य त्या वेळी योग्य त्या प्रमाणात ताणू शकतो, विशाल करू शकतो. अर्थात हा सरावाचा भाग आहे, पण अशक्य मात्र नक्कीच नाही.

गुंतणं हा आणिक एक मनाचा रंग आहे किंवा स्वभाव आहे. मनाच्या ह्या स्वभावाचा गैरफटका बरेच वेळा मन धारण करणाऱ्या देहाला सोसावा लागतो, मग त्याची इच्छा असो व नसो.

मन हे एक न दिसणारं तरीही असणार मानवाचे महत्वाचे इंद्रिय आहे. आजपर्यंत भलेभले थकले, पण मनाचा अंत खऱ्या अर्थाने लागला असे म्हणणारे अतिदुर्मिळ!! मला मन कळलं, मी कोणाच्याही मनातलं जाणू शकतो असे म्हणणे म्हणजे मोठी गंमत. कारण मनुष्य स्वतःच स्वतःचे मन जाणू शकत नाही तिथे दुसत्याचे मन काय जाणणार ? भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने म्हटले आहे की मन म्हणजेच ‘मी’ आहे. त्यामुळे भगवंताचा शोध आणि ‘मी’ चा शोध यामध्ये मूलभूत फरक काहीच नाही. पण व्यक्तिसापेक्ष त्यात फरक मानला जातो. म्हणून काही लोकं बाहेर देव शोधतात, तर काही आपल्या अंतरात देवाचा शोध घेतात.

सर्व संतांनी मनाचे वर्णन केले आहे.

“अचपळ मन माझे नावरे आवरीता”

 – समर्थ रामदास

मन वढाय वढाय 

उभया पिकाताल ढोर

किती हाकल हाकलं

फ़िरि येत पिकावर

 – संत कवयित्री बहिणाबाई

“मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धिचे कारण”,

–  संत तुकाराम महाराज

“तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी”, अशी काहीशी अवस्था प्रत्येक मनुष्याची असते. मनाचे वर्णन कितीही केले तरी कमीच पडेल. मनाच्या लहरी किती आणि कशा कार्यरत असतात याचे नेमके असे कोष्टक नाही. मन स्थिर करणे म्हणजे एका अर्थाने त्या लहरींवर स्वार होणे. दैनंदिन जीवनात सामान्यपणे मनाच्या लहरी मनुष्यावर स्वार होतात आणि मनुष्याची अक्षरशः फरफट होते. खरंतर मनुष्याने या चंचल लहरींच्या छाताडावर स्वार होऊन जीवनाचा आनंद उपभोगला पाहिजे. थोड्याश्या प्रयत्नाने हे सहज साध्य होऊ शकते, फक्त तशी प्रबळ इच्छाशक्ती मात्र हवी.

“मनातल्या मनात डोकावता यावे।

मनातल्या शक्तीला जागवता यावे।

लहरी मनाच्या जाणता यावे, आणि।

जाणलेल्या लहरींवर स्वार व्हावे।।”

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कालिंदीचे हृदयशल्य फेडले… – लेखिका : सुश्री विनिता तेलंग ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

🌸 विविधा 🌸

☆ कालिंदीचे हृदयशल्य फेडले… – लेखिका : सुश्री विनिता तेलंग ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

कालिंदीचे हृदयशल्य फेडले…

श्रावण वद्य अष्टमी..

एक-कारागृहाच्या बंद भिंतींच्या आड जन्मलेला, देवकीचा तान्हा.

दुसरा-चंद्रमौळी कुटीत, रुक्मिणीच्या कुशीत जन्मलेला, विठ्ठलपंतांचा ज्ञाना.

एक सदैव भरल्या गोकुळात, सखे-आप्त, गाई-वासरे, वने-वृन्दावने, कालिंदी-यमुनेच्या सहवासात रमला.

दुधातुपात न्हाला.

दुसरा, विजनवासात, वन्य पशूपक्षी पाहत, एकांतात, बहिष्कृतीत, ओंजळभर पाण्यासाठी तळमळला, शेणा घाणीला झेलून उरला.

एक आश्रमात शिकला, महाशक्तींना आव्हाने देत समर्थ झाला, दुसरा शिकण्यासाठी वणवण भटकला, महाभागांकडून झालेले अपमान सोसूनही शांत राहिला.

एक विविध स्त्री रूपांना मोहवणारा मुरारी, दुसरा बालब्रह्मचारी.

राजकारण ते रण, दानव ते मानव, गीत ते नृत्य, मुरली ते सुदर्शन असा एक विश्वी विस्तारलेला, दुसरा आळंदीच्या पैसाच्या खांबाशी लेखणीत सामावलेला.

एकाने धर्माची स्थापना-अधर्माचा विच्छेद यासाठी युध्द केले, दुसऱ्याने खलाचे खलत्व संपवण्याचे पसायदान मागितले.

एक एकशेवीस वर्षे जगला, प्रचंड उलथापालथी घडवून, वृक्षाच्या तळाशी प्राणांतिक विध्द झाला.

दुसरा अवघ्या एकवीस वर्षात कार्य आटोपून वृक्षाच्या मुळाशी समाधीत बद्ध झाला.

अशी जीवनकथेत भिन्नता, पण वृत्तीची मात्र एकरूपता. बिंब कोण आणि प्रतिबिंब कोण हे ठरवणे अवघड. एक योगेश्वर एक ज्ञानेश्वर. आधी एकाचे विस्तारणे आणि नंतर दुसऱ्याचे मूळ होऊन येणे, की आधी एकाने ज्ञानाचे मूळ लावून दुसऱ्याने त्याचा अर्थविस्तार करणे? जणू एकाने सर्व शक्तीनिशी समुद्र मंथन केले आणि दुसऱ्याने त्यातले अमृत आपल्या मुखी आणून घातले.

किंवा पहिल्याने स्वभावतः, सहजपणे जे केले ते दुसऱ्याने हळुवारपणे उलगडून दाखवले.

गीतेला मऱ्हाठीचा साज चढवताना ज्ञानदेवांनी जो अर्थविस्तार केला, तो अद्भुत आहे. गीतेचे मर्म सांगताना ते स्वतः विविध भूमिका जगले आहेत. ते अर्जुन होतात तेव्हा आपल्याच मनातल्या शंका स-विस्तार विचारतात. स्वतःकडे अडाणीपण घेतात. ते संजय होतात तेव्हा त्यांनाच रोमांच अनावर होतात.

ते भाष्यकाराच्या भूमिकेत जातात तेव्हा स्वतःकडे सानपण घेतात.

गुरूच्या कृपेला, व्यासांच्या प्रतिभेला अन श्रोत्यांच्या जाणतेपणाला श्रेय देऊन मोकळे होतात.

ते कृष्ण होतात तेव्हा मात्र त्याला कुरुक्षेत्रावर जे करता आले नाही ते करतात. ते अर्जुनाला खेंव देतात, त्याच्या चित्ताच्या आरशात कृष्णाला स्वतःला पाहू देतात. होरपळलेल्या अर्जुनाच्या चित्तावर उदार कृष्णमेघ होऊन बरसतात. त्याचा निर्मोही निळा शेला अर्जुनाच्या धनुष्याच्या प्रत्यंचेत गुंतू देतात. ते कृष्ण होतात तेव्हा त्याच्या अमानवी, दैवी वाटाव्या अशा कृतीमागचे मानवीपण आपल्याला उलगडून दाखवतात.

त्यांच्या कोवळ्या शब्दांत केवढे समंजस पौरुष दडले आहे!स्त्रीत्वाचा सन्मान, तिचे दुःख, त्यावरचा उतारा, सारं त्या बालयोग्याला किती नीट कळलं आहे! 

अचाट पराक्रमाच्या गाथा, उत्कट प्रीतीच्या कथा आणि रणभूमीवरची गीता यातले कृष्ण जणू वेगवेगळेच असतात आपल्यासाठी.

आपल्यासाठी कालियामर्दन म्हणजे केवळ त्याचा अजून एक पराक्रम.

यमुनेच्या डोहात ठाण मांडून बसलेला कालियासर्प गोकुळवासियांचा काळ ठरत होता. यमुनेचे पाणी दूषित झाले होते.. कृष्ण कुठेही नेऊ शकला असता गोकुळाला!किंवा करू शकला असता तह कालियाशी.

पण त्याच्यासाठी यमुना निव्वळ नदी नाही. त्याच्या गोपालांना, त्याच्या गोधनाला पोसणारी त्यांची ती माता आहे. प्रत्यक्ष कृष्णाची तर ती सखी-सहचरी आहे.

कालिया तिच्या जलदेहाला तर विटाळतो आहेच, तिच्या पवित्रतेला नासवतो आहे. तिच्यासाठी हे अपमानजनक आहे. गोकुळाच्या लोकांसाठी तिचं पाणी म्हणजे अमृत होतं. तेच आता विषमय झालं होतं.

त्यामुळे गायी वासरं, मुलं लेकरं तिच्या तीरावर येईनात. पक्षीही तिच्यावरून उडेनात. मग कालियाचा नाश, विषाचे निर्मूलन आणि पुन्हा यमुनेने नांदते होणे. बालरूपातील कृष्णाचा अचाट पराक्रम.. इतके आपल्याला कळते.

पण ज्ञानेश्वर याच्याही पुढे जातात..

काळी सावळी कालिंदी. जीवनाने भरभरून वहाणारी, तिच्या जळांत उत्कट इच्छांची कमळे आणि तिच्या पात्रावरून मुक्त विहरणारे तिच्या स्वप्नांचे पक्षी. त्यांना तिच्यात जणू ‘कृष्णा’ दिसते. मुक्त, आत्मनिर्भर, सतत पुढे जात राहणारी मनस्वी युवती.

तिच्या मुक्ततेला बांध बसलाय कालियाचा, त्याच्या दुष्ट वासनांनी विळखा घालून तिला जखडलं आहे एका जागी. तिच्या वस्त्राला हात घातलाय इतकंच नव्हे, तर तिच्या

स्वाभिमानाला, तिच्या सन्मानाला डंख आहे हा. तिच्या मनात शल्य आहे या अवहेलनेचे. तिला दुःख आहे तिच्या अपमानाचे.

कृष्ण मानवापेक्षा संवेदनशील आहे. सहृदय आहे. त्याला तिची वेदना कळते. शरीराचीच नाही, मनाचीही.

तिच्या उरात काय सलते आहे हे त्यालाच कळते आहे फक्त.

‘हे असंच चालायचं’ म्हणून पाहत बसलेलं गोकुळ, ‘या क्रूर विषारी सर्पाला मारायला कोण धजावेल’ म्हणून मूकपणाने ती वाटच टाळणारे गोकुळ.. या भरल्या गोकुळात तो एकटाच आहे, ज्याला हे जाणवलं.

म्हणून कालिया मर्दनाचं वर्णन ज्ञानेश्वर केवळ पराक्रमाच्या अंगाने करत नाहीत. पराक्रम आणि पराभव या इतकंच महत्वाचं आहे ते प्रयोजन.

कृष्णाने पराक्रम करून कालियाचा पराभव केला त्यामागचा त्याचा हेतू गोकुळाचा पाण्याचा स्रोत शुद्ध करणं इतका मर्यादित असू शकत नाही, हे ज्ञानदेवांना जाणवलं. कालिंदीला दुःखमुक्त करणं, तिच्या हृदयातला सल काढून टाकणं हे कृष्णाचं प्रयोजन आहे.

म्हणूनच असा कृष्ण कृष्णेला तिचा सखा वाटतो. कारण त्यालाच हे समजतं..

 

तिला वाहू देणं, तिला निर्धास्तपणे उचंबळता येणं हे त्याच्यासाठी फार महत्वाचं आहे!

गोकुळाला निर्धास्तपणे पाणी-धुणी करता येणं यापेक्षा कितीतरी अधिक महत्वाचं ! 

त्यामुळेच ज्ञानेश्वर लिहितात,

 

कालिंदीचें हृदयशल्य फेडिलें । 

जेणें मियां जळत गोकुळ राखिलें ।

वासरुवांसाठी लाविलें । 

विरंचीस पिसे ।।

समस्त स्त्री जातीचं ऋण फेडणं सुचवतात ज्ञानेश्वर. तिचं दुःख संपवणं हे तिला मुक्त करणं नाही, तर तिचं ऋण फेडून आपण मुक्त होतो आहोत हे ज्ञानदेवांचा कृष्ण दाखवून देतो.

स्त्रियांबाबत अशी संवेदनशीलता ही आमची परंपरा आहे, ही प्रवाहित व्हायला हवी. असे कान्होबा-ज्ञानोबा जर पावलोपावली उभे रहातील तर हे शल्य मुळापासून उपसून टाकणं अशक्य नाही! 

लेखिका : सुश्री विनीता तेलंग

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग २३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग २३ ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र – “आणखी एक. मनात आले ते बोललो नाही तर मलाच चैन पडणार नाही म्हणून सांगतो. तुम्ही काल एवढा त्रास सहन करून दत्तदर्शनासाठी वाडीला गेलात तेव्हाच तुमच्या मनातल्या भावना महाराजांपर्यंत पोचल्या आहेत. आणि त्याच महत्त्वाच्या. त्यामुळे आता परत जाऊन दिवसभर काम करून पुन्हा पौर्णिमेच्या दर्शनासाठी आज दुपारच्या बसने नृ. वाडीला यायची धडपड कराल म्हणून मुद्दाम हे सांगतोय. दगदग नका करू. “

 सासरे सांगत होते. मी आज्ञाधारकपणे मान हलवली. निरोप घेऊन पाठ वळवली. पण मन स्वस्थ नव्हतं. नकळत का होईना पण आपल्याकडून घडलेल्या चुकीमुळेच आपला संकल्प सिद्धीस जाण्यात अडथळा निर्माण झाल्याची खंत मनात घर करून राहिली होती. हातातून काहीतरी अलगद निसटून जात असल्याच्या भावनेने मन उदास झाले होते. तीच उदासी सोबत घेऊन माझा परतीचा प्रवास सुरू झाला होता!!)

एरवी सगळ्यांशीच मोजकं बोलणारे माझे सासरे आज भावनेच्या भरात कां होईना अंत:प्रेरणेने जे बोलले ते माझ्या काळजीपोटीच होते. पण त्यातही त्यांच्याही नकळत एक सूचक संदेश दत्तगुरुंनी माझ्यासाठी पेरुन ठेवला असल्याची जाणिव या परतीच्या प्रवासात माझ्या अस्वस्थ मनाला अचानक स्पर्श करुन गेली आणि मी दचकून भानावर आलो. एरवी नंतर मला कदाचित कामांच्या घाईगर्दीत जे जाणवलंही नसतं तेच ही जाणिव नेमकं मला हळूच सुचवून गेली होती!मी अक्षरश: अंतर्बाह्य शहारलो. ‘आज पौर्णिमा आहे. मी मनात आणलं तर आज पुन्हा दुपारच्या बसने नेहमीसारखं निघून नृ. वाडीला जाणं मला अशक्य नाहीय. सासऱ्यांनी जे मी करीन हे गृहित धरलं होतं त्याचा तोवर मी विचारही केला नव्हता. पण आता मात्र मी काय करु शकतो, करायला हवं याची नेमकी दिशा मला मिळाली आणि मनातल्या मनात त्याचं 

नियोजनही सुरू झालं!अर्थात ते जमेल न जमेल हे माझ्या स्वाधीन नव्हतं. जमायचं नसेल तर कांहीही होऊ शकतं. बस चुकणं, ती मिळाली तरी बंद पडणं, वाटेत अपघात होणं किंवा आज बॅंकेत पोचताच अचानक आॅडिट सुरु होणं, ए. जी. एम् अचानक ब्रॅंच व्हिजिटसाठी येणं असं कांहीही. यातल्या कोणत्याच गोष्टी माझ्या हातातल्या नव्हत्या आणि त्यापैकी कांही घडलंच तर त्याला माझा इलाजही नव्हता. अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणं एवढंच मी करू शकत होतो आणि ते मी करायचं असं ठरवून टाकलं!!

त्यामुळे अर्थातच प्रवास संपताना मनातली अस्वस्थताही कमी झाली होती. ब्रॅंचला गेल्यानंतर मात्र असंख्य व्यवधानं तिथं माझीच वाटच पहात होती. त्यामुळे कामाचं चक्र लगेच सुरु झालं न् पुढे बराच वेळ श्वास घ्यायलाही फुरसत मिळाली नाही. रांजणेंच्याजवळ मनातला विचार बोलून ठेवायचंही भान नव्हतं. गर्दीचा भर ओसरला तेव्हा सहज माझं लक्ष भिंतीवरच्या घड्याळाकडे गेलं. दुपारचे दोन वाजून गेले होते. मी रांजणेना नेमक्या परिस्थितीची कल्पना दिली. सहज शक्य झालं तर आज सव्वातीनच्या बसने परत नृ. वाडीला जाऊन यायची इच्छा असल्याचंही त्यांना सांगितलं.

“अजून तुमचं जेवणही झालेलं नाहीय. मेस बंद होण्यापूर्वी तुम्ही लगेच जाऊन जेवून या. तोवर मी आधी कॅश टॅली करून ठेवतो. म्हणजे कॅश चेक करून तुम्हाला निघता येईल. बाकीची माझी कामं तुम्ही गेल्यानंतर मी केली तरी चालू शकेल. ” रांजणेंनी मला आश्वस्त केलं. त्याक्षणानंतर सगळं मार्गी लावून मी स्टॅंण्ड गाठलं. बसमधे मनासारखी जागा मिळाली. मान मागे टेकवून मी शांतपणे डोळे मिटले. आदल्या दिवशी याच बसमधे मी असाच बसलो होतो तेव्हा पुढे काय घडणाराय याबाबतीत मी पूर्णतः अनभिज्ञ होतो. त्यानंतरच्या सगळ्याच घटना माझ्या नजरेसमोरुन सरकत जात असताना मला त्या स्वप्नवतच वाटत राहिल्या.

नृ. वाडीला पोचलो तेव्हा मनातली उत्कट इच्छा फलद्रूप झाल्याचं समाधान मन उल्हसित करीत होतं!दत्तदर्शन घेताना आत्यंतिक आनंदभावनेने मन भरून येत असतानाच माझी मिटली नजर ओलावली होती!

दर्शन झाल्यानंतर हीच कृतार्थ भावना मनात घेऊन मी पायऱ्या चढून वर आलो आणि मला वास्तवाचं भान आलं. रात्रीचे दहा वाजत आले होते. इथेच मुक्काम केला तर पहाटे वेळेत सांगलीला पोचून सहाची बस मिळवणं शक्य होणार नव्हतं. त्यासाठी मुक्कामाला सांगलीला जाणं आवश्यक होतं.

सांगली स्टॅंडला बस येताच मी घाईघाईने बसमधून उतरलो. पावलं नकळत सासुरवाडीच्या घराच्या दिशेने चालू लागताच मी थबकलो. तिथे जाणं मला योग्य वाटेना. काल सासऱ्यांनी पोटतिडकीने मला जे करु नका असं सांगितलं होतं नेमकं तेच मी केलेलं होतं. ‘आता त्यांच्याकडे जायचं तर हे लक्षात येऊन त्यांचं मन दुखावलं जाऊ शकतं. तसं होऊन चालणार नाही’ असा विचार मनात आला. मी परत फिरलो. खिशातल्या पैशांचा अंदाज घेतला. केवळ दोनतीन तास पाठ टेकण्यासाठी लाॅजवर जाणं ही त्याक्षणी गरज नव्हे तर चैन ठरणार होती हे लक्षात आलं आणि पुन्हा स्टॅण्डवर आलो. ती पूर्ण रात्र सांगली स्टँडवर बसून काढली!

स्टॅंडच्या बसून रात्र जागून काढताना सलगच्या धावपळीच्या प्रवासानंतरचा अपरिहार्य असा थकवा होताच पण त्याचा त्रास मात्र जाणवत नव्हता. कारण मनातलं पौर्णिमा अंतरली नसल्याचं समाधान त्यावर फुंकर घालत होतं! त्याच मन:स्थितीत मी कधीकाळी ऐकलेले बाबांचे शब्द मला स्वच्छ आठवले.

‘दत्तसेवा अनेकांना खूप खडतर वाटते. त्यामुळेच ‘मी’ करतो असं म्हणून ती प्रत्येकालाच जमत नाही. निश्चय केला तरी त्या निश्चयापासून परावृत्त करणारे प्रसंग सतत समोर येत रहातात. तेच आपल्या कसोटीचे क्षण!जे त्या कसोटीला खरे उतरतील तेच तरतात…!’

त्या रात्री बाबांच्या या शब्दांचा नेमका अर्थ मला माझ्या त्या दिवशीच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थाने समजला होता!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एका कथानायिकेचं दुसऱ्या कथानायिकेला पत्र… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

?विविधा ?

☆ एका कथानायिकेचं दुसऱ्या कथानायिकेला पत्र… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

(एका पुस्तकातल्या कथानायिकेनं दुसऱ्या पुस्तकातल्या कथानायिकेला लिहिलेलं पत्र…)

‘पारुल‘ या हर्ष देहेजिया यांच्या अनुवादित पुस्तकातली *पारुल* ही कथानायिका आणि पु. शी. रेगे यांच्या ‘ सावित्री ‘ या पुस्तकातली *सावित्री* ही कथानायिका )

प्रिय सावित्री,

जितक्या सहजपणे मी तुला एकेरी प्रिय संबोधते तितक्याच सहजतेनं मी तुला आलिंगनही देते. आश्चर्य वाटलं असेल ना तुला? मी कोण, कुठली, तुला माहितही नाही तरीही तुला पत्र लिहिते, अनोळखी असूनही प्रेमानं आलिंगन देते. खरंय ते! अगं तुलाच काय, मलाही आश्चर्य वाटलं की, मी अशी काय वागतेय. जरी माझा स्वभाव मनमोकळा असला तरीही मी इतकी आपलेपणानं पहिल्यांदा कुणाशीच बोलत नाही. पण ही किमया मात्र तुझी आहे. तुझ्या स्वभावाची, तुझ्या व्यक्तिमत्त्वाची. आता माझी ओळख करून देते हं. अगं ही ओळख म्हणजे तरी काय? निव्वळ आपल्या सगुण अस्तित्वाचे दाखले देणं इतकंच. माणूस माणसाला ओळखायच्या आधी त्याला समजावा लागतो अन मग त्या समजण्याचं सवयीत रूपांतर झालं की तो ओळखता येतो. अशी ओळख आपली बहुदा या पत्र व्यवहारातूनच होईल.

अगं, हे सगळं बोलण्याच्या नादात तुला सांगायला विसरलेच की, मी कोण ते. मी पारुल. उत्तर भारतात राहते. एकटीच असते. हा एकटेपणा हीच खरंतर माझी मोठी ओळख. माझी कथा तुला सांगेनच नंतर कधी पण तुझी कथा जशी मला समजली तसं न राहवून मी तुला हे पत्रं लिहलं. खरंतर तुझं-माझं आयुष्य खूप वेगळं आहे. जणूकाही एका नदीचे आपण दोन काठ आहोत, समांतर असूनही कधीच न भेटणारे. खळाळणारी जीवनदायिनी नदी हीच काय ती आपल्याला जोडणारी आणि म्हणलं तर अलगही करणारी. त्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सुखदुःखात सुद्धा फरक आहे. अगं, इतकंच काय आपल्या विचारांत, जगण्यातदेखील फरक आहे. आपण दोघी वेगवेगळ्या स्वभावधर्माच्या आहोत. तू अत्यंत संयमी, प्रसंगी विरक्त आणि अत्यंत बुद्धिप्रामाण्यवादी आहेस. प्रवाहात ओली झालीस तरी तुझा काठ विरघळू देत नाहीस. तर मी काठाचं भान विसरत अधिकाधिक नदीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. तुझ्या घरात शिक्षणाचा वारसा आहे. वाचन संस्कार आहे. याउलट माझं घर साधं आहे, जीवनही साधं आहे. पतीच्या मृत्यू पश्चातलं एकाकीपण आहे. तुझ्याइतका काही शिक्षणाचा, बुद्धिप्रामाण्यवादाचा माझ्याशी संबंध आला नाही. सावित्री, तू ठरवून एखाद्या दिशेने प्रवास करणारी आहेस, तीरावर येणाऱ्या लाटांना सजगपणे सामोर जाणं तुझं ध्येय आहे. तुझ्या काठांवर उमटणारी पावलं किती खोल उमटु द्यावीत… हे तू ठरवतेस. माझं तसं नाही माझ्या काठावरची पाऊलं पाण्याच्या स्पर्शाने काठोकाठ भरतात आणि धडकणाऱ्या लाटांनी चिंब झाली की त्यातल्या ओलाव्यानं थोडी विरघळतात. माझं अस्तित्व विलीन होण्यात मी धन्यता मानते.

तुझं प्रेम… तुझा त्याग हा खरंच विशाल आहे. तुझ्या विचारांची अमर्याद ताकद हे स्त्रीत्वही जपते. तू निर्गुण निराकार प्रेमाला स्वतःत मुरवून घेतलंस तू अद्वैत साधलंस. मी सगुण प्रेमाच्या सहाय्याने निर्गुणाला शोधलं. जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा उपभाग घेऊन विलासिनी स्वरूपात मी स्वतःला साकारलं. अद्वैत साधण्यासाठी मला संघर्ष करावा लागला. मला बुद्धीशी झगडा करावा लागला. मला स्पर्शाचा आधार घ्यावासा वाटला. जीवनाचं उद्दिष्ट जसं मला कळलं तसं मला निर्गुणाचा महत्त्व कळलं. तू तर हे पहिल्यापासून जाणूनच होतीस. विचारांच्या सहाय्याने तू दोन पावलं पुढं होतीस. तरीही एक जाणवतं… तुझ्या-माझ्यात एकचं साम्य आहे, कदाचित तो जीवनदायीनीचा संगत असर असावा. नितळ, तरलता मिळवण्याची आशा. प्रेम हे जगण्याचं कारण असणं तरीही कर्तव्यपूर्तीची ओढ असणं.

अजून काय सांगू, एकाच भेटीत किती बोलावं. जे बोललेय ते तरी तर्कसंगत आहे की नाही, तेही माहित नाही. पण दोन्ही काठाचं प्रतिबिंब सामावणारी ती जीवनदायीनी आपला संवाद घडवून आणेल हे नक्की. म्हणजे निदान आता एकमेकांवर आदळणाऱ्या लाटा तरी परिचयाच्या असतील.

तुझी पारुल.

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares