मराठी साहित्य – विविधा ☆ “बूमरँग” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “बूमरँग” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

शेवटी काल मी माझे प्रयत्न थांबवण्याचा निर्णय घेतला. प्रयत्न होता तो बायकोला टू व्हीलर शिकवण्याचा. यासाठी मी सगळे प्रयत्न केले.

तुला जमेल… तु शिकशील… तु करून दाखवशील… सोप्पं आहे ते… वाटतं तितकं कठीण नाही… मी आहे नां… फोर व्हीलर सारखं खूप किचकट नाही… किती दिवस तू माझ्यावर किंवा रिक्षावर अवलंबून राहशील… अशा प्रोत्साहन देणाऱ्या अनेक वाक्यांपैकी काही मी मनापासून ऐकवली… तर काही मनात नसतांना सुध्दा…

आता नवीन गाड्या आहेत. किक फार कमी वेळा मारावी लागते. बटन दाबलं की सुरू होते. पाय जमिनीवर टेकतील इतकीच उंची असते. आणि एक्सीलरेटर हळूहळू वाढवलं कि आपोआप पुढे जाते. असा अभ्यासक्रमाचा काही भाग तोंडी सांगून झाला होता.

थोडफार प्रात्यक्षिक सुध्दा सुरू झालं होतं. पण त्यात गाडी शिकण्यापेक्षा सुरुवातीला अडचण आली ती साइड मिररची…

ते गोल गोल आरसे काढून टाका, आणि दुसरे चांगले चौकोनी, उभे, आणि स्लिम असतील ते लावा… पहिली सुचना…

आता काय झालं मला काही सुचेना… का?… असं विचारण्याची मी हिंमत केली. तसंही बऱ्याचदा का?… असं हिंमत करुनच विचारावं लागतं…

त्या गोल आरशात मी गोल गोलच दिसते…

अगं पहिला मुद्दा तो आरसा आपल्या स्वत:ला पाहण्यासाठी नसतोच. मागून कोण येतय हे पाहण्यासाठी व अंदाज घेण्यासाठी असतो. आणि असंही बाहेर पडतांना तु मोठ्या, पूर्ण उंचीच्या, आणि गोल नसलेल्या आरशात पाहूनच बाहेर पडतेस नां. मग परत त्या छोट्या आरशात स्वत:ला पाहण्याची काय गरज… आणि आरसा जे आहे तसंच काहीसं दाखवण्याचा प्रयत्न करतो… शेवटचं वाक्य मी हळूच म्हंटल. तरीसुद्धा माझा चेहरा चौकोनी आणि तिचा गोल झाला आहे असं उगाचच पण खरं तेच वाटल…

मागून कोण येतंय हे पाहण्यासाठी व अंदाज घेण्यासाठी आरसा असतो हे वाक्य तिला पाठ झाल्यामुळे तिसऱ्या दिवशीच्या प्रात्यक्षिकात ती गाडी चालवत असतांनाच तिने गाडीचा वेग कमी केला, आणि थोडी बाजूला करून उभी राहिली…

आता काय झालं?… माझा प्रश्न..

काही नाही, आरशात एक बाई मागून येते आहे ती दिसली… म्हणून…

तीला पुढे जायचं असेल तर ती जाईल नां… तितकी जागा आहे… पण तु वेग कमी करत बाजूला गाडी थांबवली हे मस्त…

प्रश्न तिला जायला जागा आहे का नाही याचा नाहीच… तिची साडी मस्त आहे… कुठली आहे… आणि पदर कसा आहे हे बघायचं आहे‌… त्या बाईंच सोडा, पण या आरशात साडी काही नीट दिसलीच नाही…

मी निरुत्तर…

पण या थांबण्यामुळे तिने साडी सह बाईंकडे… आणि मी त्या… बाईंसह साडीकडे पाहून घेतलं…

पण या कारणांमुळे मी माझे प्रयत्न सोडले असं नाही. त्याला कारण वेगळंच होतं…

आज सुटिचा दिवस होता. रोज दोघांच सकाळी कामावर जाणं. सकाळचं जेवण डब्यात. यामुळे घरी नाश्ता हा प्रकार जवळपास नसतोच. आज मी सहज म्हटलं. खायला जरा पोहे करा… वर मस्त नारळाचा किंवा खोबऱ्याचा किस… कोथिंबीर… लिंबू… मजा येइल…

त्यावर उत्तर आलं… हं तो वरचा डबा घ्या… पोहे आहेत त्यात… चाळणीने चाळून घ्या… थोडे भिजवा… दोनचार मिरच्यांचे तुकडे करा… बाकी फोडणी, मीठ, हळद हे मी सांगते… आणि खोबऱ्याचं पण बघते…

एखाद्या गोष्टीचं खोबरं होण म्हणजे काय असतं, ते मला समजलं…

येवढ्यावरच ते बोलणं थांबलं नाही, तर फक्त रिक्षेचा उल्लेख सोडला तर माझी वाक्य…

तुला जमेल… तु शिकशील… तु करून दाखवशील… सोप्पं आहे ते… वाटतं तितकं कठीण नाही… मी आहे नां… हि वाक्य तशीच, तेवढ्याच तन्मयतेने आणि उत्साहाने मलाच ऐकून दाखवली…

यात परत फोर व्हीलर सारखं किचकट नाही, या माझ्या वाक्याप्रमाणे पाकातले चिरोटे करण्याइतकं किंवा अनारशा सारखं किचकट नाही… असं पण ऐकाव लागलं.

आणि मी माझे शिकवण्याचे प्रयत्न सोडून द्यायचे ठरवलं… तिला फक्त गाडी शिकवायची होती… पण मला बरंच काही शिकावं लागलं असतं… शिकवणं कठिण असेल पण शिकणंही सोप्पं नसतं…

आता काय?… तिने पोहे करायला घेतले आहेत… आणि पोहे खाऊन झाल्यावर तिला एका ठिकाणी जायचं आहे तिथे सोडायला मी…

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ह्याचा इन्श्युरन्स निघत नाही” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? विविधा  ?

☆ “ह्याचा इन्श्युरन्स निघत नाही” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

माझा एक दुकानदार मित्र आहे. वडिलोपार्जित व्यवसायात आहे. कधीही येता जाता त्याच्या दुकानापाशी हात करताना मला दुकानाबाहेर ठेवलेले उंदरांचे दोन पिंजरे दिसतात. पण त्यात पकडले गेलेले उंदीर मात्र कधी दिसले नाहीत. मी त्याला एकदा सहज विचारलं, “बाबा रे, आजतागायत एकदा तरी उंदीर सापडला का पिंजऱ्यात?” तो हसून म्हणाला,” दुकान सुरुवातीला नवं होतं,तेव्हां सहा महिने उंदीर सापडायचे. नंतर पुन्हा कधी सापडले नाहीत. सगळे उद्योग करुन झाले. भजी ठेवली,कॅडबरी ठेवली,चीज क्यूब्ज ठेवून पाहिले,नॉनव्हेजचे तुकडे ठेवून बघितले. पण हे उंदीर अफाट हुशार झालेत. त्यांच्या आवडीची कुठलीही गोष्ट त्यात ठेवा,तो सापळा आहे,हे त्यांना अगदी बरोबर समजतं. ते सगळ्या दुकानात धुडगूस घालतात, पण सापळ्याकडे फिरकतच नाहीत. मी आपला रित म्हणून रोज मोठ्या आशेनं पिंजरा लावूनच दुकान वाढवतो.” मीही हसण्याचा आनंद घेऊन त्याचा निरोप घेतला. पण त्याचं वाक्य मात्र डोक्यात घुमत राहिलं – आजकालचे उंदीरसुद्धा हुशार झालेत…!

असाच एक दुसरा प्रसंग माझ्या अगदी चांगला लक्षात राहिला आहे. आमच्या दारी गायींसाठी एका मोठ्या सिमेंटच्या पात्रात पाणी ठेवलेलं असतं. उन्हाळ्यात अनेकदा गायी फार लांबून लांबून पाण्यासाठी येतात. त्या कुणालाही कसलाही त्रास देत नाहीत. त्या येतात आणि पाणी पिऊन शांतपणे निघून जातात. पण एकानं त्या गायींना हुसकून लावण्याचा उद्योग सुरु केला. दगड मारणे, काठीने मारणे असे प्रकार सुरु केले. गायींचं त्यांच्या दारात थांबणं बंद झालं. आमच्याकडे येऊन पाणी पिऊन जायच्या. पुढं एका दिवाळीत वसुबारसेच्या दिवशी मी गायींना खाऊ घालत होतो, तेव्हां तेच गृहस्थ पुरणाची पोळी घेऊन आले आणि गायीला खाऊ घालण्याचा प्रयत्न करु लागले. त्या गायीनं बाकी सगळ्यांचे गोग्रास घेतले, पण ह्यांच्याकडे ढुंकूनही न पाहता शांतपणे निघून गेली. गायीसुद्धा हुशार झाल्यात..!

हीच गोष्ट मधमाशांची आणि मुंग्यांची. एखाद्या ठिकाणी त्यांच्या जिवाला धोका असेल तर त्या ठिकाणी त्या वसत नाहीत. उलट त्या त्यांची अधिकाधिक सुरक्षितता शोधतात. माणसांचा उपद्रव होणार नाही, याची पूर्ण दक्षता घेतात. ‘लक्ष्मणरेषा’ नावाचा मुंग्यांचा उपद्रव टाळण्यासाठी उपयुक्त असा खडू मिळतो. त्याच्या रेषा धान्याच्या पोत्याभोवती मारल्या तर मुंग्या त्या बाजूनं फिरकत नाहीत. पण त्यावरचा मार्ग बरोब्बर शोधून काढतात. एकदा उन्हात आईनं वाळवणं घातली होती आणि बाजूनं लक्ष्मणरेषा मारल्या होत्या. पण मुंग्या असल्या बिलंदर की, त्यांनी गच्चीत पडलेलं एक छोटंसं वाळकं भुईमुगाच्या शेंगेचं टरफल ढकलत आणलं आणि त्या रेषेवर ठेवून वेढा फोडला. संध्याकाळी उन्हं कलल्यावर गोळा करायला गेलो तर सगळा प्रताप लक्षात आला. पण तोवर मुंग्यांचा डाव बऱ्यापैकी यशस्वी झाला होता. म्हणजे, मुंग्यासुद्धा शहाण्या झाल्यात..!

प्रश्न आहे तो आपण माणसांचाच..! पर्यावरणातला सर्वात बुद्धिमान प्राणी असूनसुद्धा जगण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असणारं शहाणपण माणसाला का मिळवता येत नाही? स्वतःच्या बुद्धीचा वापर करुन मार्ग काढता येत नसेल तर किमान इतरांच्या अनुभवातून तरी योग्य तो बोध मनुष्यप्राणी का घेत नाही? ‘जब वुई मेट’ नावाच्या हिंदी सिनेमात भर रात्री अनोळखी प्रवाशाचा शोध घेण्यासाठी रेल्वेतून उतरलेल्या करिना कपूरला वयानं तिच्याहून वडील असणारा स्टेशन मास्तर “अकेली लडकी खुली हुई तिजोरी की तरह होती है” हे सांगत असतो. पण “यह ग्यान मुफ्त का है या इसके पैसे चार्ज करते हैं? क्योंकी चिल्लर नहीं है मेरे पास” असं मोठ्या तोऱ्यात सुनावणाऱ्या त्या करिना कपूरच्या तोंडचं ते वाक्य आपल्याला विनोदी वाटतं. पण त्या स्टेशन मास्तरच्या सांगण्यातली काळजी एकालाही दिसत नाही,जाणवत नाही. हाच तर आपल्या माणसांच्या शहाणपणातला उसवलेला टाका आहे.

रात्री तीन वाजता कुणालाही न सांगता, मित्रांसोबत घराबाहेर भटकणारी तरुण मुलंमुली दिसणं पुणेकरांना नवीन नाही. पावसाळ्यात कुणालाच न सांगता, कॉलेजला दांडी मारुन, खोटं बोलून परस्पर लोणावळा, भुशी डॅम, ताम्हिणी घाट अशा ठिकाणी भटकणारी मुलंमुली खरोखरच व्यवहारज्ञानी असतात का? सेल्फी काढण्याच्या नादात कड्यावरून कोसळलेली मुलं मुली, धोकादायक धबधब्यात उतरलेली माणसं खरोखरच प्रॅक्टिकली शहाणी असतात का? हा प्रश्न माझ्यासारखाच अनेकांना पडत असेल.

“आईवडील म्हणजे आपले सर्वात मोठे शत्रू” असं वाटणाऱ्या तरुण पिढीची आपल्या समाजात मुळीच वानवा नाही. मुलांच्या आयुष्यात घडणाऱ्या कित्येक गोष्टी अनेकांना ठाऊक असतात, पण त्यांच्या पालकांनाच ठाऊक नसतात. कित्येकांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांचे पालक ॲड नसतात. आपल्या मुलामुलींचं मित्र-मैत्रीण मंडळ पालकांना माहितच नसतं. आपल्या आयुष्यात काहीही घडलं तरी घरच्यांना सांगावंसं मुलांना का वाटू नये? हा खरोखरच काळजीचा मुद्दा आहे. आपल्याच परिवारातल्या माणसांपासून मुलंमुली गोष्टी लपवून का ठेवतात? अत्यंत महत्वाच्या गोष्टींबाबत सुद्धा आईवडीलांपेक्षा त्यांना मित्र अधिक जवळचे का वाटतात? आपल्या आयुष्यातली अत्यंत मोठी घटना घडल्यानंतर सुद्धा मुलंमुली पहिला फोन आपल्या पालकांना का करत नाहीत? या प्रश्नाचं उत्तर गांभीर्यानं शोधलं पाहिजे.

नागरिकशास्त्र हा विषय १०० गुणांचा केला पाहिजे,असं आता अनेकांना वाटतं. ते समाजातली एकूण परिस्थिती पाहता खरंच आहे. पण त्याहीआधी व्यवहारज्ञानाचं आणि स्वतःची सुरक्षितता जपण्याचं शिक्षण आपल्या कुटुंबातूनच मुलामुलींना मिळणं नितांत आवश्यक आहे. जगण्यातलं शहाणपण शिकण्यासाठी मुंग्या,उंदीर,गायी किंवा अन्य प्राणिमात्र कुठल्याही वेगळ्या व्यवस्थेकडे जात नाहीत. त्यांना ते शिक्षण त्यांच्या पालकांकडून मिळतं. मधमाशा सुद्धा त्यांची कुटुंब प्रमुख असलेल्या राणीमाशीचं ऐकतात. जगण्यातली शिस्त मोडत नाहीत. मन मानेल तसं वागत नाहीत किंवा वडीलधाऱ्यांचं सांगणं धुडकावून सुद्धा लावत नाहीत. त्यांच्या जगण्यातले निसर्गधर्म आणि परिवार व्यवस्था ते पूर्ण निगुतीनं आणि आदरानं जपतात, मोडीत काढत नाहीत.

आईवडील आणि कुटुंबातल्या अन्य मोठ्या माणसांच्या संपर्कात राहणं, त्यांच्याशी चांगला संवाद असणं, वागण्याबोलण्यात पारदर्शकता असणं म्हणजे बिनकोठडीचा तुरुंगवास नसतो. उलट तेच आपल्यासाठीचं अतिशय सुरक्षित आणि सहृदय वातावरण असतं, हे शहाणपण आपण माणसं कधी शिकणार? कारण, जगण्यातलं शहाणपण नसल्यापोटी जी किंमत मोजावी लागते, तिचा इन्श्युरन्स निघत नसतो..!

© श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ओंजळ… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

 

🔅 विविधा 🔅

ओंजळ☆ सौ शालिनी जोशी

कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती।

करमुले तू गोविंदम् प्रभाते कर दर्शनम्।।

सकाळी झोपेतून जागे झाल्यावर आपण दोन मिनिटे अंथरुणावर बसून वरील श्लोक म्हणतो. यावेळी आपण दोन्ही हात एकमेकांना चिकटवून त्याची ओंजळ करतो. त्यावर लक्ष स्थिर करून त्यामध्ये सामावलेल्या लक्ष्मी आणि सरस्वती आणि गोविंद यांचे दर्शन घेतो. त्यांची आठवण ठेवून हाताने दिवसभर कार्य करण्याची जणू आपण प्रतिज्ञा करतो. लक्ष्मी आणि सरस्वती यांना प्राप्त करण्याचे सामर्थ्य तो गोविंद करमुले स्थित होऊन आपणाला देतो. असे हे ओंजळीचे महत्त्व तीनही देवांचे वरदान ओंजळीत आपण सामावून घेतो. त्यामुळे सर्व दिवस सार्थकी लागतो.

ओंजळ म्हटलं की समोर येते पारिजातकाच्या किंवा मोगऱ्याच्या फुलांनी भरलेली ओंजळ. ओंजळीत ही फुले अलगदपणे सांभाळली जातात. त्याच्या कोमल पणाला कोणताही धक्का लागत नाही. देवाला फुले वाहताना ओंजळीने वाहतात. ओंजळ मोकळी झाली तरी सुगंध टिकून राहतो. कोणाला दान द्यायचे झाले तरी देणाऱ्याच्या ओंजळीने घेणाऱ्याच्या ओंजळीत दिले जाते. खूप तहान लागली तरी ओंजळभर पाणी समाधान करते. सूर्याला अर्ध देताना ओंजळीने देतात. हात उंचावून ओंजळभर पाणी त्याला अर्पण करतात. सवाष्णीची किंवा देवीची ओटी भरताना ओंजळीतून तांदूळ सुपारी ओटीत घालतात. लाजलेली स्री आपले तोंड ओंजळीत लपविते, तर दुःखी स्त्री ओंजळीत आपल्या अश्रूंना वाट करून देते. ओंजळीत आपण देवाचा प्रसाद घेतो. प्रियजनांचे हात ओंजळीत घेतल्यावर वेगळ्या प्रेमाची अनुभूती येते. कोणाला धीर देतानाही दोन्ही करतल आपल्या करतलात घतले की दिलासा मिळतो. या अंजलीचे दोन्ही हात जेव्हा जवळ येतात तेव्हा नमस्कार होतो. मिटलेली ही ओंजळ नम्रता शिकवते. अशा प्रकारे ओंजळ भासते छोटी पण असते मोठी. हेच दातृत्वाचे रूप, भावनेचे द्योतक. स्वीकारायला ओंजळ तशी द्यायलाही. ती रिती होत नाही, भरत असते कधी सुखदुःखाने तर कधी आशीर्वादाने.

एखादा मानी म्हणतो मी कोणाच्या ओंजळीने पाणी पिणार नाही. म्हणजे दुसऱ्याच्या पदरचे खाणार नाही. ओंजळीला अंजली असेही म्हणतात. तर ज्ञानेश्वर ‘अंजुळी’ म्हणतात. अकराव्या अध्यायाचे शेवटी ते म्हणतात,

भरुनी सद्भावाची अंजुळी। मिया ओविया फुले मोकळी।

अर्पिली अंघ्रियुगूली ।विश्वरूपाच्या।।

११/७०८

ज्ञानेश्वरांची ओंजळ ही सदभावाची आहे आणि ती ओव्या रुपी फुलांनी भरली आहे. विश्वरूपाच्या चरणांवर त्यांनी ती मोकळी केली आहे अर्पण केली आहे. ण

निसर्गाच्या रुपाने परमेश्वर असेच आपल्याला भरभरून देत असतो. घ्यायला आपली ओंजळ अपुरी होते.

अनंत हस्ते कमलाकराने

देता किती घेशील दो कराने।

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ४५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ४५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- आरती खऱ्या खोट्याच्या सीमारेषेवर घुटमळत होती… “समीरच्या सगळ्या आठवणी मनात रुतून बसल्यात हो माझ्याs. रात्री अंथरुणाला पाठ टेकली तरी मिटल्या डोळ्यांसमोर हात पुढे पसरुन माझ्याकडे येण्यासाठी झेपावत असतो तोss! आपल्याला मुलगा झाला तर तो समीरच आहे कां हे फक्त मीच सांगू शकेन.. तुम्ही कुणीही नाहीss.. ” भावनावेगाने स्वतःलाच बजावावं तसं ती बोलली आणि ऊठून आत निघून गेली.. !!

आता या सगळ्यातून बाहेर पडायला ‘लिलाताई’ हे एकच उत्तर होतं! जावं कां तिच्याकडे?भेटावं तिला? बोलावं तिच्याशी?.. हो.. जायला हवंच…!…

मी पौर्णिमेची आतुरतेने वाट पाहू लागलो…!)

तिच्याकडे जायचं. तिला भेटायचं. तिच्याशी मोकळेपणाने बोलायचं. समीरबाळाच्या जाण्यानंतरचं पुत्रवियोगाच्या दु:खानं झाकोळून गेलेलं माझं मन:स्वास्थ्य आणि नंतर तिच्या पत्रातील माझं सांत्वन करणाऱ्या आशेच्या किरणस्पर्शाने स्थिरावलेलं माझं मन.. हे सगळं कोणताही आडपडदा न ठेवता सांगून टाकायचं… असं सगळं मनाशी ठरवूनच मी त्या पौर्णिमेच्या दिवशी घराबाहेर पडलो. नृसिंहवाडीला जाऊन आधी दत्तदर्शन घेऊन थेट कुरुंदवाडची वाट धरली. तिच्या घराबाहेर उभा राहिलो आणि मनात चलबिचल सुरु झाली. तिचेही वडील नुकतेच तर गेलेत. तीसुध्दा त्या दु:खातच तर असणाराय. तिला आपलं दुःख सांगून त्रास कां द्यायचा असंच वाटू लागलं. मग तिला कांही सांगणं, विचारणं मनातच दडपून टाकलं. तेवढ्यांत दार उघडून दारात तीच उभी. आनंदाश्चर्याने पहातच राहिली क्षणभर….

“तू.. ! असा अचानक?.. ये.. बैस.. ”

ती मोकळेपणाने म्हणाली. आतून पाण्याचं तांब्याभांडं आणून माझ्यापुढे ठेवलंन्.

“लिलाताई, मी आज आधी न कळवता तुला भेटायला आलो ते दोन कारणांसाठी.. ” मी मुद्द्यालाच हात घातला.

“होय? म्हणजे रे.. ?”

“समीरचं आजारपण, त्याचं जाणं.. हे सगळं घडलं नसतं तरी मी तुमचे नाना गेल्याचं समजल्यावर तुला भेटायला आलो असतोच हे एक आणि समीर गेल्याचं तुला माझ्या आईकडून समजल्यानंतर तू सांत्वनाचं जे पत्र पाठवलं होतंस ते वाचताच क्षणी मला जो दिलासा मिळालाय त्याबद्दल तुझ्याशी समक्ष भेटून बोलल्याशिवाय मला चैनच पडत नव्हतं म्हणूनही आलोय. “

“नाना गेल्याचं समजलं तेव्हा तू न् आरती दोघेही माझ्या आईला भेटायलाही गेला होतात ना? आईनं सांगितलंय मला. “

“हो. त्यावेळी खूप कांही सांगत होत्या त्या मला. विशेषत: तुझ्याबद्दलच बरंचसं… “

“आईपण ना… ! माझ्याबद्दल काय सांगत होती?”

“माझ्या बाबांसारखी

तुलाही वाचासिद्धी प्राप्त झालीय असं त्या म्हणत होत्या. “

ती स्वत:शीच हसली. मग क्षणभर गंभीर झाली.

“माझी आई भोळीभाबडी आहे रे. तिला आपलं वाटतं तसं. बोलाफुलाला गाठ पडावी असेच योगायोग रे हे. बाकी कांही नाही… “

“माझे बाबाही असंच म्हणायचे. पण ते तेव्हढंच नव्हतं हे तू स्वत:ही अनुभवलंयस”

तिने चमकून माझ्याकडं पाहिलं. काय बोलावं तिला समजेना. मग विचारपूर्वक स्वतःशी कांही एक ठरवल्यासारखं ती शांतपणे म्हणाली,

“आईनं तुला जे सांगितलं ते योगायोगाने घडावं तसंच तर होतं सगळं. ते ज्यांच्या बाबतीत घडलं ते आमचे नाना आणि माझा मोठा भाऊ आण्णा यांच्यासंबंधातलं. जायच्या आधी नाना आठ दिवस खूप आजारी होते. तब्येतीच्या बाबतीत चढउतार सुरूच असायचे. मुद्दाम सवड काढून असंच एकदा आम्ही दोघेही त्यांना भेटायला गेलो होतो. पण तेव्हा ते पूर्णतः ग्लानीतच होते. आम्ही येऊन भेटून गेलोय हे त्यांना समजलंही नाहीये ही रुखरुख तिथून परत येताना माझ्या मनात रुतूनच बसली होती जशीकांही. मला स्वस्थता कशी ती नव्हतीच. अंथरुणाला पाठ टेकली की मनात विचार यायचे ते नानांचेच. ते कसे असतील? ते बरे होतील ना? हे असेच सगळे. त्यादिवशी रात्री डोळा लागला होता तोही याच मानसिक अस्वस्थतेत. आणि खूप वेळाने जाग आली ती डोअरबेल वाजल्याच्या आवाजाने. हे घरी नव्हते. कांही कामासाठी परगावी गेले होते. ते परत यायला अद्याप एक दोन दिवस अवकाश होता. तरीही तेच आले असतील कां असं मला वाटलं न् बेल दुसऱ्यांदा वाजली तशी मी पटकन् उठलेच. दार उघडून पाहिलं तर दारात नाना उभे. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना…

“नानाs, तुम्ही.. ? असे एकटेच.. ? बरे आहात ना?.. “

“हो अगं. काल वाडीला दर्शनाला आलो होतो. आज परत जायचंय. जाण्यापूर्वी तुला भेटून जावं असं वाटलं म्हणून आलोय. “

“बरं झालं आलात. बसा हं. मी पाणी देते न् चहा करते लगेच. “

“एs.. तू बस इथं. मी तुला भेटायला आलोय. चहा प्यायला नाही. मला जायचंय लगेच.. “

मी थोडावेळ बसले. बोलले त्यांच्याशी. मग चहा करायला म्हणून उठले. आत जाऊन पाण्याचं तांब्याभांडं घेऊन बाहेर आले तर नाना तिथं नव्हतेच. दार सताड उघडंच. मला भास झाला कीं स्वप्नच हे?.. असा विचार मनात आला तेवढ्यांत फोनची रिंग वाजली. फोन आण्णाचा.. मोठ्या भावाचा होता. नाना नुकतेच गेलेत हे सांगणारा.. !!

पहाटेचे पाच वाजले होते. ऐकलं आणि सरसरुन काटाच आला अंगावर.. ! सोफ्याचा आधार घेत कशीबशी खुर्चीवर टेकले.

ते स्वप्न नव्हतं. तो भासही नव्हता. नाना खरंच आले होते. त्यांची भेट न झाल्याची त्या दिवशीची माझ्या मनातली रूखरुख कमी करण्यासाठी ते जाण्यापूर्वी खरंच इथे येऊन मला भेटून गेले होते. हे एरवी कितीही अशक्य, असंभव, अविश्वसनीय वाटेल असं असलं तरी माझ्यापुरतं हेच सत्य होतं! नाना जाताना मला भेटून लाख मोलाचं समाधान देऊन गेले होते हेच माझ्यासाठी ते गेल्याच्या दु:खावर फु़ंकर घालणारं होतं.. !!”

मी भारावल्या सारखा ऐकत होतो.

“आणि.. तू आण्णाच्या दीर्घ आजारपणात त्याला दिलेल्या औषधाने तो झटक्यात बरा झाला असं तुझ्या आई सांगत होत्या त्याचं काय?तो चमत्कार नव्हता?”

“नाना गेले त्याआधीच्या चार-पाच महिन्यांपूर्वीची ती गोष्ट. मी अशीच नानांनाच भेटायला माहेरी गेले होते. तेव्हाच्या गप्पांत आईनेच आण्णाच्या आजारपणाबद्दल सांगितलं होतं. ते आजारपण वरवर साधं वाटलं तरी आण्णासाठी मात्र असह्य वेदनादायी होतं. दुखणं म्हणजे एक दिवस त्याच्या हातापायांची आग व्हायला सुरुवात झाली आणि हळूहळू ती अंगभर पसरली. डॉक्टरांची औषधं, इतर वेगवेगळे उपाय सगळं होऊनही गुण येत नव्हता. तो रात्रंदिवस असह्य वेदनांनी तळमळत रहायचा. आईकडून हे ऐकलं त्याक्षणी मी थक्कच झाले. कारण कालच मला एक स्वप्न पडलं होतं. ते असंबध्दच वाटलं होतं तेव्हा पण ते तसं नव्हतं जाणवताच मला आश्चर्याचा धक्काच बसला.

“आई, तुला खरं नाही वाटणार पण कालच मला एक स्वप्न पडलं होतं. स्वप्नांत आण्णा माझ्या घरी आला होता. त्याला काय त्रास होतोय ते सगळं अगदी काकुळतीने मला सांगत होता. ‘कांहीही कर पण मला यातून बरं कर’ असं विनवीत होता. मी त्याला दिलासा दिला. ‘माझ्याकडे औषध आहे ते लावते. तुला लगेच बरं वाटेल’ असंही मी म्हटलं. परसदारी जाऊन कसला तरी झाडपाला घेऊन आले. तो पाट्यावर बारीक वाटून त्याचा लेप त्याच्या सगळ्या अंगाला लावून घ्यायला सांगितलं आणि तो लेप लावताच आण्णा लगेच बराही झाला… ” मी हे सगळं आईला सांगितलं खरं पण तो झाडपाला कसला हे मात्र मला आठवेना. त्यांना काटेही होते. ती पानं चिंचेच्या पानासारखी होती पण चिंचेची पानं नव्हती कारण चिंचेच्या झाडाला काटे नसतात. तिथून परत आल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि हे दोघेही नेहमीप्रमाणे सकाळी नित्यदर्शनासाठी नृ. वाडीला जाऊन परतीच्या वाटेवर आम्ही नेहमी पाच मिनिटं एका पारावर बसायचो तसे बसलो. बोलता बोलता हाताला चाळा म्हणून त्या पारावर पडलेल्या वाळक्या काड्या उचलून मी मोडत रहायचे. त्यादिवशीही तसं करत असताना बोटाला एक काटा टोचला. पाहिलं तर त्या काडीवरचा वाळलेला पाला चिंचेच्या पानांसारखाच दिसला. मी नजर वर करून त्या झाडाकडे पाहिलं. ते शमीचं झाड होतं. शमी औषधी असते हे ऐकून माहित होतं म्हणून मी आण्णाच्या घरी फोन करून वहिनीशी बोलले. रोज शमीचा पाला वाटून त्याचा लेप लावायला सांगितलं. ती रोज तो लेप आण्णाला लावू लागली आणि तीन दिवसांत त्याचा दाह पूर्ण नाहीसा झाला. ” लिलाताई म्हणाली.

सगळं ऐकून मी पूर्णत: निश्चिंत झालो.

“लिलाताई, मला दिलासा देणारा असाच एक चमत्कार माझ्याही बाबतीत घडलाय. “

“कसला चमत्कार?” तिने आश्चर्याने विचारलं.

“तू मला पाठवलेलं ते सांत्वनपर पत्र हा चमत्कारच आहे माझ्यासाठी. ” मी म्हंटलं. तो कसा ते तिला सविस्तर समजावून सांगितलं.

” समीरचा आजार असा बरा होण्याच्या पलिकडे गेला होता‌. ते आमच्या घरीही माझ्या खेरीज कुणालाच माहित नसताना तुला नेमकं कसं समजलं? याचं आश्चर्य वाटतंय मला. कारण ‘समीरचा आजार पृथ्वीवरच्या औषधाने बरा होण्याच्या पलिकडे गेलेला असल्याने तो बरा होऊन परत येण्यासाठी देवाघरी गेलाय यावर विश्वास ठेव’ असं तू लिहिलं होतंस. आठवतंय? हे अशाच शब्दात लिहिण्याची बुद्धी तुला कशी झाली ही उत्सुकता आहे माझ्या मनात. “

हे सगळं ती भान हरपून ऐकत होती. मी बोलायचं थांबलो तशी ती भानावर आली. शांतपणे उठली आणि आत गेली. ती येईल म्हणून मी वाट पहात राहिलो. मग उठून उत्सुकतेने आत डोकावून पाहिलं तर ती देवापुढे हात जोडून बसलेली आणि तिच्या मिटल्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. काय करावं ते न समजून मी खाल मानेनं बाहेर आलो. तिची वाट पहात बसून राहिलो. कांही क्षणात ती बाहेर आली. अंगाऱ्याचं बोट माझ्या कपाळावर टेकवलंन.

“तुझ्या डोळ्यांत पाणी का गं? माझं कांही चुकलं कां?”.

“नाही रे. तुझं कांहीही चुकलेलं नाहीय. मी रडत नाहीय अरे, हे समाधानाचे, कृतार्थतेचे अश्रू आहेत. “

“म्हणजे?”

“तुझ्या आईकडून समीर गेल्याचं मला समजलं त्या क्षणापासून खूप अस्वस्थ होते रे मी. तू हे सगळं कसं सहन करत असशील याच विचाराने व्याकुळ होते. घरी येताच सुचतील तसे चार शब्द लिहून पत्र पोस्टात टाकलं तेव्हा कुठे थोडी शांत झाले होते. खरं सांगू? मी काय लिहिलं होतं ते विसरूनही गेले होते. आज तू आलास, मनातलं सगळं बोललास तेव्हा ते मला नव्यानं समजलं. समीरचा आजार पृथ्वीवरच्या औषधाने बरे होण्याच्या पलीकडे गेलेला असल्याचं शप्पथ सांगते मला नव्हतं माहित. ते सगळं ‘मी’ लिहिलेलं नव्हतंच तर. ते दत्तगुरुंनी माझ्याकडून लिहून घेतलं होतं हे आज मला समजतंय. त्यांना दिलासा द्यायचा होता तुला आणि त्यासाठी मध्यस्थ म्हणून मी त्यांना योग्य वाटले हे लक्षात आलं आणि मी भरून पावले. सगळं कसं झालं मला खरंच माहित नाही. पण हा दत्तगुरुंचाच सांगावा आहे असं समज आणि निश्चिंत रहा.. !”

सगळं ऐकलं आणि मी पूर्णत: निश्चिंत झालो.

तिचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो. मन शांत होतं पण… या सगळ्या अघटीतामागचं गूढ मात्र उकललं नव्हतंच. ते माझ्या मनातल्या दत्तमूर्तीच्या चेहऱ्यावरील स्मितहास्यात लपून अधिकच गहिरं होत चाललं होतं!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जगणे व्हावे गाणे… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

☆ जगणे व्हावे गाणे… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

‘जगणे व्हावे गाणे’! जगणे आणि गाणे या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संलग्न आहेत. गाण्याशिवाय जगण्याला अर्थ नाही आणि जगण्याशिवाय गाण्याला! जगताना जो ताल, सूर आपण अनुभवतो तोच गाण्याची संबंधित केला की त्याला योग्य असे गाणे आपल्या ओठावर येते. आपल्या मूड प्रमाणे आपण गाणे गुणगुणतो, आवाज चांगला असेल तर गातो, किंवा नसेल तर फक्त ऐकतो! आपल्या मनात त्या गाण्याच्या सूरांचे प्रतिसाद उमटत असतात. आपण आनंदी मूडमध्ये असलो तर आपोआपच लतादीदींची ” ‘आनंदी आनंद गडे’ किंवा’ माझे गाणे एकच गाणे नित्याचे गाणे.. ‘ अशा प्रकारची गाणी आठवतात.

पण तेच एखादी दुःखद घटना घडली की मनात “जन पळभर म्हणतील हाय हाय.. ” यासारखे अर्थपूर्ण गाणे आठवते किंवा मुकेशची दुःखी हिंदी गाणी आठवतात! गाणं आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाशी निगडित असते. ज्याला गाणं आवडत नाही अशी व्यक्ती विरळाच! कोणी मराठी, कोणी हिंदी गाणी ऐकत असेल तर कोणी भक्ती गीते, भावगीतांचा प्रेमी असेल तर कोणाला उडत्या चालीची गाणी आवडत असतील! एखादा लताचा फॅन असेल तर दुसरा आशा भोसले किंवा सुमन कल्याणपुरचा! याशिवाय अनेक गायक गायिकांचे फॅन ही असतातच!

काहींना जुनी गाणी आवडतात तर काहींना नवी गाणी आवडतात. काहींच्या मते गाण्यात जुने-नवे असे नसतेच. गाण्याचा सूर महत्वाचा!चाल चांगली पाहिजे!

आपल्या गायनाच्या आवडी विविध प्रकारच्या असतात. एखाद्याला एखाद्या गायक-गायिकेचे इतके प्रेम असते की, तिचे/त्याचे नाव त्याच्या घरावर, गाडीवर कुठेही लिहिलेले आढळेल! असा एक आमचा परिचित आहे सुद्धा की, तो फक्त ” आशा ” प्रेमी आहे! तिच्या गाण्यातच त्याचे ‘जगणे’ चालू असते. विरह गीते ऐकणाऱ्यांचा वर्ग वेगळाच असतो! बरेचदा तो त्याच्या वैयक्तिक जीवनाशी निगडित असा विषय हे असू शकतो. एखाद्याला हलकीफुलकी गाणी आवडतात तर एखाद्याला फक्त जुनी गाणी आवडतात. पूर्वीच्या काळी रेडिओ हेच हिंदी, मराठी गाणी ऐकणाऱ्यांसाठी साधन होते. त्यापूर्वी ग्रामोफोन वापरला जाई पण असे हे ग्रामोफोन बहुतेक सधन वर्गाकडेच असत!

एक काळ असा होता की घरात रेडिओ किंवा टेप रेकॉर्डर प्रत्येकाकडे नसे. पण हॉटेलमध्ये असणाऱ्या टेप रेकॉर्डर वर विशिष्ट गाणे लावण्यासाठी काही पैसे देऊन ते गाणे लावायला सांगितले जात असे. बरेचदा इराण्याच्या हॉटेलवर हा व्यवसाय चालत असे.

 बालगंधर्वांच्या काळामध्ये त्यांची गाणी ऐकत जगणारा एक मोठा वर्ग होता! दीनानाथ मंगेशकर यांचे नाट्यसंगीत ऐकणे हेही गाण्याच्या चाहत्यांचे स्पेशल दालन असे. संगीत नाटके बघणे आणि त्यातील पदे ग्रामोफोनवर ऐकणे ही एक सुसंस्कृत समाजात असलेली एक आवड होती..

आणि ही गोष्ट अर्थातच मोठेपणा ची समजली जाई..

 पुढे रेडिओ आला आणि विविध प्रकारची गाणी वेगवेगळ्या वेळी रेडिओवर ऐकायला मिळू लागली. सकाळी भक्ती गीते, नंतर मराठी चित्रपट गीते यावर लोकांचे टाईम टेबल बनू लागले.

हिंदी गाण्यांमध्ये बिनाका गीतमाला, सांज गीते या सारखे कार्यक्रम फेमस झाले!

एक तारखेला ‘खुश आहे जमाना आज पहिली तारीख है ‘या गाण्याने सकाळच्या जुन्या हिंदी गाण्यांची सुरुवात झाली की मन खुश होत असे! टेप रेकॉर्डर आला आणि गाण्याच्या शौकिनांना एक नवीन विश्व सापडले! एकच गाणे अनेक वेळा आवडीप्रमाणे ऐकायला मिळू लागले. यासंबंधी माझी एक आठवण माझ्या मिस्टरांच्या गाण्याच्या आवडीशी निगडित आहे. त्यांना “उगवला चंद्र पुनवेचा” हे बकुळ पंडित यांनी गायलेले गाणे इतके आवडत असे की, पौर्णिमा जाऊन अमावस्या उगवली तरी त्यांच्या टेपवर हे गाणे वाजतच असे!

जगण्याशी गाण्यांचा इतका निकटचा संबंध असतो की त्या आपल्या आवडीवर प्रत्त्येकाचे जगणे चालू असते!

बालपणी ऐकलेली “असावा सुंदर चॉकलेटचा बंगला” किंवा “सांग सांग भोलानाथ ” यासारखी गाणी अजूनही लहान मुलांना आवडतात आणि ती आयुष्यभर लक्षात राहतात. तरुणपणात चंद्राची गाणी किंवा प्रेमाची गाणी ऐकणे तरुणांना आवडते तर प्रौढ लोकांना सुधीर फडके यांची गाणी मोहात पाडतात. असा हा ऐकिव गाण्यांचा काळ संपला आणि टीव्ही आला. तेव्हा जगणे आणि गाणे अधिकच जवळचे झाले. टीव्हीच्या वेळेनुसार आपल्या आवडत्या गायक गायिकांना टीव्हीवर बघत आपण गाण्याचा आस्वाद घेऊ लागलो. ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही जाऊन रंगीत टिव्ही आला आणि गाण्यांची दुनिया अधिकच रंगीबेरंगी झाली. ‘ “बागो मे बहार है” म्हणत फिरणारी राजेश खन्ना आणि शर्मिला जोडी बघताना नजरेला जीवन अधिकच रंगीबेरंगी वाटू लागले. ‘जगणे व्हावे गाणे’ अशी रंगीत स्वप्नं डोळ्यासमोर येऊ लागली.

अशावेळी अमोल पालेकर चा “रजनी गंधा” आठवतो. मध्यमवर्गीय तरुण गाण्यातच आपल्या प्रेयसीला कसा शोधत असतो त्याचे मनमोहक चित्रण ‘रजनीगंधा ‘या सिनेमात आहे. जगण्याशी गाण्याचे नाते अतूट आहे आणि ते प्राचीन काळापासून आहे. गाण्याच्या मैफिलीतून गाणारे जुने गायक जीव ओतून गाणे गात की जे मनाला जाऊन भिडत असे.

या संबंधीची तानसेन यांची गोष्ट आपल्या ला माहिती आहे. त्यांच्या गाण्याने पशू, पक्षी जवळ येऊन गाणे ऐकत तर विशिष्ट राग -मल्हार गायल्या वर पाऊस ही पडत असे!

ग्रामोफोन, टेप रेकॉर्डर, टीव्ही, मोबाईल अशी विविध साधने दुनियेत आली आणि जीवन गाणे अगदी घरात येऊन थांबले! गाणं नसेल तर जीवन नाही अशीच परिस्थिती आली!

आता तर कानामध्ये बड्स(buds) घालून मुले गाणी ऐकत गाड्या चालवतात, काम करतात आणि अभ्यासही करतात.. माझ्या नातीला ती जर गाणं ऐकत अभ्यास करत असेल तर मी जरा रागावते, “अगं, गाणं ऐकत तुझं अभ्यासावर लक्ष कसं केंद्रित होणार?” तर ती म्हणते, “आजी, गाणं ऐकतच माझा अभ्यास चांगला होतो आणि गणित लवकर सुटतात!” तर अशीही गाण्याची जादू!

गाण्याचा उपयोग नाटकांतून ही चांगला केला गेला. बालगंधर्वा सारख्या गायकांनी गाण्याला नाटकात प्रतिष्ठा मिळवून दिली.

अलीकडे तर गायन हे काही आजारांवर एक थेरपी म्हणून वापरले जाते, तर प्रेग्नेंसी मध्ये सुद्धा विशिष्ट प्रकारच्या गाण्यांची सुरावट ऐकली तर त्याचा गर्भावर परिणाम होतो असे सिद्ध झाले आहे. त्यामुळे जन्माला येण्याच्या अगोदर पासूनच ‘गर्भसंस्कार’ करण्यासाठी गायन कलेचा उपयोग होतो!

काही लोकांना गाण्याचे हे महत्त्व कळत नाही. ती केवळ “रडगाणी”च गात राहतात. हाही गाण्याचा एक प्रकार! कितीही चांगली परिस्थिती असली तरी सतत तक्रार करायला, रडायला यांना आवडते त्यांच्या जीवनात रडण्याचीच संगत असते! अशी माणसे सोबतीला नको वाटतात.

गाणं जगण्याला अधिक सुसह्य करतो आणि जगणे आनंदमय करते! असा हा जगणं आणि गाणं याचा निकटचा संबंध असतो.. अशावेळी मला लतादीदींचे गाणे आठवते, ” माझे जीवन गाणे…, गाणे.., व्यथा असो, आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, कधी वाऱ्यातून, कधी ताऱ्यातून, गाती एकच गाणे, गाणे, माझे जीवन गाणे, गाणे!’ तर असं हे गाणं! गाण्याने जीवन समृद्ध बनते. आणि जगणं हे सुरमयी बनते! जगणं आणि गाणं या दोन्ही एकमेकांना पूरक गोष्टी आहेत ज्यात आपल्याला मनापासून आनंद मिळतो!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

मो. 8087974168 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माघ—महाशिवरात्र… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

 

🔅 विविधा 🔅

☆ माघ—महाशिवरात्र☆ सौ शालिनी जोशी

विश्वच ज्याचे नृत्यालय

लिला करी उत्पत्तिलय

नटराज शोभे नाव

तोच शिव शंकर महादेव॥ 

भगवान शिवाच्या उपासनेचा पवित्र दिवस म्हणजे माघ वद्य चतुर्दशी. या दिवशी शिव म्हणजे महादेव यांची भक्ती भावाने पूजा व उपासना करतात. शिवलीलामृत, शिवमहिम्न, रुद्र अशा ग्रंथांचे पारायण करतात. मूर्तीला अभिषेक करतात. बेल व धोत्र्याचे फुल वाहतात. बारा ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी व इतर शिवमंदिरात जत्रा भरतात. या पूजेमागे काही कथा सांगितल्या जातात.

त्यातील एक पौराणिक कथा-

समुद्रमंथन झाले तेव्हा त्यातून विष बाहेर निघाले. पृथ्वीचा नाश करू पाहणारे ते विष भगवान शंकरांनी प्राशन केले. त्यामुळे त्यांच्या शरीराचा दाह झाला. देह काळा पडला. वैद्यानी रात्रभर जागरणाचा उपाय सांगितला. तेव्हा सर्व देवानी रात्रभर जागरण व नृत्य केले. शंकराने तांडव नृत्य केले. म्हणून आजही महाशिवरात्रीच्या रात्री जागर केला जातो. म्हणून ही चतुर्दशीची रात्र महाशिवरात्र म्हणून ओळखले जाते.

अशीच आणखी एक पौराणिक कथा-

एक पारधी सावज शोधण्यासाठी झाडावर बसला होता. संपूर्ण दिवस गेला तरी त्याला शिकार मिळाली नाही. एक हरीण पाणी पिण्यासाठी आले. पारधी बाण सोडणार इतक्यात ते हरीण म्हणाले,’ मी माझ्या कुटुंबीयांना भेटून त्यांचा निरोप घेऊन येतो’.पारधी ‘हो’ म्हणाला. पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते. व झाडाखाली शिवपिंड होती. पारध्याने सहज नकळत किंवा सावज स्पष्ट दिसावे म्हणून बेलाचे एक एक पान तोडून खाली टाकायला सुरुवात केली. ती पाने शिवपिंडी वरती पडली. नकळत का होईना पारध्याच्या हातून शिव उपासना घडली. हरिण परत आले. त्याच्या बरोबर त्याचे कुटुंबही आले. प्रत्येक जण ‘मला मार, मला मार’ असे पारध्याला विनवू लागला. ते पाहून पारध्याच्या मनात त्यांच्या विषयी दया उत्पन्न झाली .प्राणी असूनही हरणे आपले कर्तव्य विसरत नाहीत. मी ही माझ्या मानवता धर्म, दया धर्म पाळला पाहिजे. त्यांने त्या सर्वांना जीवदान दिले. हे पाहून शिवशंकर सर्वांवर प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना कृपा प्रसाद दिला. त्या हरणाला मृगनक्षत्र आणि पारध्याला व्याध म्हणून आकाशात नेहमी करता स्थान दिले.तो दिवस महाशिवरात्रीचा होता. अशीच शिवाची कृपा सर्वांवर व्हावी म्हणून ही शिवाची उपासना .

शिवपार्वतीच्या विवाहाचा हा दिवस असेही म्हणतात. भगवान शिव हे आदि गुरु त्यांच्या पासून योग परंपरा निर्माण झाली. योग विज्ञान उगंम पावले .हजार वर्षे ध्यान केल्यावर ते स्थिर बनले, तो हा महाशिवरात्रीचा दिवस. म्हणून योगी महाशिवरात्रीकडे स्थैर्याची रात्र म्हणून बघतात.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ अंतर दृष्टिकोनातलं ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

??

☆ अंतर दृष्टिकोनातलं ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

हिंदीमध्ये ‘ दृष्टिकोन ‘ या मराठी शब्दासाठी ‘ नजरिया ‘ असा एक छान शब्द आहे. नजर आणि नजरिया यात फरक आहे. नजर म्हणजे दृष्टी आणि नजरिया म्हणजे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन किंवा विचार करण्याची दिशा. त्यावरून एक सुंदर आणि प्रेरणादायी वाक्य आहे. ‘ नजर बदलो, नजारे बदल जायेंगे, सोच बदलो सितारे बदल जायेंगे, कश्तियाँ बदलने की जरुरत नहीं, दिशा बदलो, किनारे खुद-ब-खुद बदल जायेंगे. ‘

या वाक्याची आठवण येण्याचं कारण म्हणजे दोन वेगवेगळ्या पुस्तकांचं वाचन करत असताना, त्यातील काही प्रसंग वाचून मनात उठलेली विचारांची वादळं. त्या दोन गोष्टींनी मनाला अगदी हलवून सोडलं. व पु काळेंचं ‘ माझं माझ्यापाशी ‘ या नावाचं एक अतिशय सुंदर पुस्तक आहे. ते वेळ मिळाला की मी अधूनमधून वाचत असतो. या पुस्तकात ‘ अमर चित्रपट ‘ या नावाचा एक लेख आहे. त्यात ‘ प्रभात ‘ चित्रपट निर्मित १९३७ सालच्या ‘ कुंकू ‘ चित्रपटाबद्दल अतिशय मूलभूत विचार वपुंनी मांडले आहेत. दुसरं पुस्तक मी सध्या वाचतो आहे त्याचं नाव आहे ‘ आश्रम नावाचं घर : कहाणी श्रद्धानंद महिलाश्रमाची ‘. अचला जोशी यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. आधी या दोन घटना कोणत्या ते जाणून घेऊ या.

आजच्या काळात बालाजरठ विवाह होत नाही पण काही वर्षांपूर्वी असे विवाह सर्रास होत असत. बालाजरठ विवाह म्हणजे एखाद्या अगदी कोवळ्या लहान मुलीचे लग्न साठ सत्तर वर्षाच्या वृद्धाशी लावणे. नाटककार गो ब देवल यांचं ‘ संगीत शारदा ‘ हे नाटक याच विषयावर आधारित आहे. ‘ कुंकू ‘ या व्ही शांताराम दिग्दर्शित चित्रपटात हाच विषय हाताळला आहे पण जरा वेगळ्या पद्धतीने. ‘ कुंकू ‘ चित्रपटाची सुरुवातच लहान मुले नाटकाचा खेळ खेळतात आणि त्यात एक सात आठ वर्षांची मुलगी संगीत शारदा मधील शारदा बनते. एक दहा बारा वर्षांचा मुलगा दाढी मिशा लावून वृद्ध बनतो. शारदेचा विवाह या वृद्धाशी लावून देण्याचा प्रसंग येतो, तेव्हा ही चिमुरडी मुलगी मी म्हाताऱ्याशी लग्न करणार नाही असं ठणकावून सांगते. तिला मग इतर मुलं सांगतात की अगं, हे नाटक आहे. नाटकापुरती भूमिका करायची. पण नाटक म्हणून सुद्धा ती वृद्धाशी लग्न करायला सुद्धा नकार देते. मग पुढे चित्रपटातील कथा सुरु होते. चित्रपटातील नीरा नावाच्या नायिकेचा विवाह तिचा दारिद्र्याने गांजलेला आणि पैशाचा लोभी असलेला मामा वकील असलेल्या आणि ज्यांना सगळे काकासाहेब असे संबोधतात अशा एका वृद्धाशी लावून देतो.

नीरासुद्धा आपल्या मनाविरुद्ध झालेल्या या लग्नाबद्दल जणू बंड करून उठते. ती ग्रुप फोटो काढायच्या वेळी सुद्धा येत नाही. त्यावेळी तिचा मामा तिला म्हणतो, ‘ फोटोला सुद्धा आली नाहीस. तुला जराही लाज वाटली नाही का ? ‘ तेव्हा ती त्या मामांना, मामीला आणि ज्यांच्याशी लग्न झाले त्यांना खडे बोल सुनावते. ती म्हणते, ‘ एका लहान तरुण मुलीचा वृद्धाशी विवाह करताना, गरीब गायीला कसायाच्या गळ्यात बांधताना तुम्हाला लाज नाही वाटली ? ‘ ती आपल्या नवऱ्याला, काकासाहेबांना म्हणते, ‘ तुमच्या मुलीच्या\नातीच्या वयाच्या मुलीशी लग्न करताना तुम्हाला लाज नाही वाटली ? लाज तर तुम्हाला वाटायला हवी. ‘

ती आपल्या पतीच्या खोलीत त्याच्याबरोबर झोपायला जात नाही. घरातील मोठ्या बायकांचं सांगणं ऐकत नाही. तिचा तिच्या मनाशी आणि या सगळ्यांशी उघड संघर्ष सुरु आहे. त्या घरात पूर्वीच्या काळातील षट्कोनी आकाराचे एक टोल देणारे लंबकाचे घड्याळ दाखवले आहे. ते घड्याळ एकदा बंद पडलेले असते. तेव्हा काकासाहेब आपल्या वृद्ध नोकराला घड्याळाला चाबी दिली नाहीस का असे विचारतात. तो नोकर म्हणतो, ‘ मालक, ते घड्याळ बी आता माझ्यासारखंच म्हातारं झालं आहे. कितीबी चाबी द्या, कव्हा बंद पडंल त्याचा नेम न्हायी. ‘ हे वाक्य तो बोलतो स्वतःसाठी पण ते झोंबतात मात्र काकासाहेबांना. हे घड्याळ म्हणजे जणू काकासाहेबांच्या वृद्धत्वाचे प्रतीक.

चित्रपटात एक क्षण असा येतो की काकासाहेबांना आपल्या वागण्याचा पश्चाताप होतो. ते नीरेचं कुंकू आपल्या हातानं पुसतात. त्यावेळी नीरा देखील वाघिणीसारखी चवताळून उठते. आता कुंकू लावीन तर काकासाहेबांच्या हातूनच असा निश्चय ती करते. एखाद्याचं हृदयपरिवर्तन, विचारपरिवर्तन होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तीच या चित्रपटात दाखवली आहे आणि तेच या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. शेवटी काकासाहेब नीरेच्या कपाळी कुंकू लावतात पण ते पित्याच्या मायेनं. मनातली वासना नष्ट झालेली असते. यावेळी समाज काय म्हणेल असा विचार करत असलेल्या नीरेला ते म्हणतात, ‘ कसला विचार करतेस या जगाचा ? ज्या जगाला एका तरुणीचा एका म्हाताऱ्याशी विवाह लावून देताना काही वाटलं नाही अशा जगाचा काय विचार करायचा ! पित्याच्या जागी असलेल्या वृद्धानं आपल्या तरुण बायकोला मुलगी समजून शुद्ध भावनेनं कुंकू लावलं हे जर चालणार नसेल तर अशा समाजाची काय पर्वा करायची ?

चित्रपटात शेवटी काकासाहेबांना आत्महत्या करताना दाखवलं आहे. मृत्यूपूर्वी ते आपल्या तरुण पत्नीला लिहिलेल्या पत्रात म्हणतात, ‘ बाळ, माझ्या मृत्यूशिवाय तुझी सुटका होणं शक्य नाही हे मी जाणून आहे. माझ्या मृत्यूनंतर तो पुनर्विवाह करावास, तुला भरपूर संसारसुख मिळावं अशी माझी इच्छा आहे. त्याशिवाय माझ्या आत्म्याला शांतता मिळणार नाही. तुझा प्रेमळ पिता. ‘ इथे खरं तर चित्रपट संपतो पण खरा चित्रपट सुरु होतो तो आपल्या मनात. मनाला आतून हलवून टाकण्याची ताकद या चित्रपटातील घटनात आहे. व्ही शांताराम यांचं दिग्दर्शन तर अप्रतिम. वपुंनी या चित्रपटाबद्दल फार सुंदर आणि सविस्तर लिहिलं आहे. ते मुळातूनच वाचावं. ते वाचून मी हा चित्रपट आवर्जून पाहिला.

दुसरी घटना आहे ‘ आश्रम नावाचं घर ‘ या पुस्तकातली. श्रद्धानंद महिलाश्रमाची ही कहाणी आहे. या आश्रमाने अनेक निराधार स्त्रिया, विधवा, अन्याय, अत्याचाराने होरपळलेल्या स्त्रियांना आधार दिला आहे. अशा अनेक स्त्रियांच्या कहाण्या या पुस्तकात वाचायला मिळतात. त्यातीलच एक कृष्णाबाई. तिची कहाणी वाचून मी अस्वस्थ झालो आणि वाईटही वाटले. न कळत्या वयात म्हणजे वयाच्या केवळ नवव्या वर्षी कृष्णीचं लग्न एका मोठ्या एकत्र कुटुंबातील मुलाशी झालं. कृष्णेला न्हाण येण्यापूर्वीच मुदतीच्या तापानं तिचा नवरा वारला. माहेरची वाट बंदच होती. सासरच्यांनी तिच्यावर अनेक बंधनं लादली. तिला बाहेर जायलाच काय पण बाहेरच्या घरातही यायला बंदी केली. पण कृष्णी जसजशी वयात येऊ लागली, तशी घरातल्या कर्त्या पुरुषांनी तिच्यावर वाईट नजरेनं पाहायला सुरुवात केली. कधी सासूबाई चार दिवस बाहेरच्याला बसल्या तर सासरे तिला पाय चेपायला बोलावू लागले. एके दिवशी पाय चेपता चेपता त्यांनी दार बंद करून घेतलं. नंतर चुलत सासऱ्यांनी हाच कित्ता गिरवला. कृष्णीला सुरुवातीला जरा वेगळं वाटलं. अर्थात बरं वाईट कळण्याचं तिचं फारसं वय नव्हतं आणि जे काही घडत होतं त्यात तिचा दोषही नव्हता. पण तिने आपल्या सासूबाईंच्या कानावर ही गोष्ट घातली. पण घरातील कर्त्या पुरुषांसमोर बोलण्याची त्यांची प्राज्ञा नव्हती. पुरुष जे काही आपल्याला देतात ते मुकाट्यानं घ्यायचं असं त्यांनी कृष्णीला सांगितलं. तीस माणसांच्या एकत्र कुटुंबात ही गोष्ट कर्णोपकर्णी व्हायला कितीसा वेळ लागणार ? दिरांनीही तिचा फायदा घायला सुरुवात केली. लवकरच ती घरातल्या सर्वांची हक्काची मत्ता झाली. अशातच तिला दिवस राहिले. मग तिच्या सासऱ्यांनी तिला आश्रमात आणून सोडले. तेव्हा तिला नववा महिना लागला होता. बाळंत झाल्यावर मुलाला आश्रमातच सोडून सासरी परत यायला तिला सासऱ्यांनी बजावले होते.

आश्रमातील बाईंना तिची ही अवस्था पाहून वाईट वाटले. त्यांनी तिला समजावून सांगितले की बाळ तू इथेच निर्धास्तपणे राहा. इथे कोणीही तुला त्रास द्यायला येणार नाही. पण कृष्णीचा मनात परत जायचे होते. तिला त्या जीवनाची चटक लागली होती. बाईंनी तिला सांगितलं की तुझं रूप, वय साथ देतं आहे, तोपर्यंतच तुला सासरी विचारतील. एकदा का वय सरलं की मग तुझे हाल कुत्राही खाणार नाही. एके दिवशी कृष्णी प्रसूत झाली. तिनं एका गोंडस मुलाला जन्म दिला. एका सकाळी कोणाला नकळत त्या बाळाला तिथेच टाकून कृष्णी पुन्हा आपल्या सासरी निघून गेली.

तसं पाहिलं तर या दोन घटनांचा परस्पर संबंध काही नाही. ‘ कुंकू ‘ चित्रपटातील नीरा आणि या महिलाश्रमात आलेली कृष्णी या दोघीही परिस्थितीच्या बळी ठरल्या. पण दोघींच्या आयुष्याला नंतर जे वळण मिळालं त्यात जमीनअस्मानाचा फरक आहे. निराला बऱ्यावाईटाची जाण आहे. ती परिस्थितीचा बळी ठरली तरी आहे त्या परिस्थितीत जगण्याचे ती नाकारते. परिस्थितीविरुद्ध बंड करून उठते. तिच्या वागण्याने काकासाहेबांना सुद्धा आपल्या चुकीची जाणीव झाली आहे. तिने पुन्हा लग्न करून तिचा संसार भविष्यात फुलावा यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याचे समर्पण केलं. याउलट गोष्ट कृष्णीची आहे. ती जरी परिस्थितीची बळी ठरली आणि जे काही घडले त्यात तिचा दोष नसला, तरी मुळातच त्या नरकात आपले आयुष्य वाया घालवण्यापेक्षा काही वेगळा विचार ती करू शकली असती. तिला उर्वरित आयुष्य महिलाश्रमात घालवून स्वतःची प्रगती साधता आली असती. पुढे शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहता आले असते. पण अशा प्रकारची उर्मीच तिच्या मनात उठत नाही. हा दृष्टिकोनातला फरक नीरा आणि कृष्णी यांच्यात आपल्याला दिसतो.

आहे त्या परिस्थितीत तसेच जगणे किंवा कसेबसे दिवस काढणे याला जगणं म्हणता येणार नाही. परिस्थितीशी संघर्ष तर सगळ्यांच्या नशिबी असतो. पण मी आहे त्याच परिस्थितीत राहणार नाही. स्वकष्टाने, प्रयत्नाने, बुद्धीने, जिद्दीने मी पुढे जायचा प्रयत्न करीन यातच मानवी जीवनाचे साफल्य आहे. मी जे कोणते काम करतो, ज्या कोणत्या पदावर आहे, त्यापेक्षा आणखी काही वर्षांनी मी नक्कीच पुढे गेलेलो असेन, मी काहीतरी नवीन शिकेन.

ज्या परिस्थितीत मी जन्मलो, जगलो त्याच परिस्थितीत नक्कीच निवृत्त होणार नाही, त्याच परिस्थितीत नक्कीच मरणार नाही अशा प्रकारची दुर्दम्य आशा आणि जिद्द जो मनात बाळगतो, त्याच्या आयुष्याचे सोने होते. यातील आहे त्याच परिस्थितीत खितपत राहून आनंद मानणाऱ्या व्यक्तींची प्रतिनिधी कृष्णी आहे तर प्राप्त परिस्थितीशी संघर्ष करून पुढचं प्रगतीचं पाऊल टाकू पाहणाऱ्या व्यक्तींची प्रतिनिधी नीरा आहे. हा दृष्टिकोनातला फरक आहे. म्हणून त्या प्रसिद्ध हिंदी ओळी पुन्हा आठवतात. ‘ नजर बदलो, नजारे बदल जायेंगे, सोच बदलो सितारे बदल जायेंगे, कश्तीया बदलने की जरुरत नहीं, दिशा बदलो, किनारे खुद-ब-खुद बदल जायेंगे. ‘

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आत्मा ‘रमण’… ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

🌸 विविधा 🌸

☆ आत्मा ‘रमण’… ☆ प्रा. भरत खैरकर 

‘मौन म्हणजे काय?’ विचारल्यावर रमण महर्षींनी चूप राहणे म्हणजे मौन नाही तर तेच अनंत असं प्रकटीकरण आहे, असे सांगितले. वाणी आणि कुठलाही संकल्प नसलेली अवस्था म्हणजे मौन आहे! ते साधण्यासाठी कुठलीतरी धारणा मनात घेऊन त्याचं मूळ शोधलं पाहिजे. अशा एकाग्रतेनेच मौन प्राप्त होईल हे अभ्यासाने शक्य आहे. कोणतीही मानसिक क्रिया न करता केलेली साधना म्हणजे मौन आहे. मनाला वश करणे हेच खरं मौन आहे.

ज्यावेळी स्त्रिया डोक्यावर घागर घेऊन इतर बायकांशी बोलत असतात.. चालत असतात. तेव्हा त्यांचं लक्ष डोक्यावरच्या घागरीतल्या पाण्यावरच असतं त्या केवळ बोलत असतात. अशाच प्रकारे जेव्हा एखादा ज्ञानी पुरुष समाजात वावरत असतो. तेव्हा त्याच्या साधनेत कुठलाही प्रकारची बाधा तो येऊ देत नाही. कारण त्याचं मन हे त्या घागरी सारखं ब्रह्मात स्थिर असतं.

माणसाचा स्थायीभाव हा शांती आहे. पण मन मात्र त्यामध्ये बाधा आणत असल्याने तो अशांत बनतो. त्यामुळेच मौन साधल्याने आपोआपच शांतीकडे प्रवास सुरू होतो.

मनाचा शोध घ्यायला सुरुवात केल्यावर आपणास लक्षात येईल की ते लपून बसते ते दिसतच नाही. आत्ता इथे तर थोड्यावेळात दुसरीकडे!असं ते लपाछपी खेळतय. मात्र मन दुसरं तिसरं काही नसून विचारांची सरमिसळ आहे. आपल्या विचारात संकल्पाची निर्मिती झाल्यामुळे आपण त्याच्या निवारणासाठी, पूर्तीसाठी पुन्हा विचार करू लागतो. ह्या स्थितीला.. प्रक्रियेला आपण मन ह्या संज्ञेने संबोधतो.

विचार आणि विवेक जोडणारी गोष्ट म्हणजे बुद्धी होय. अहंभाव, मन, बुद्धी ह्या सगळ्या एकाच नाण्याच्या बाजू आहेत. आपण ज्याला वस्तुतः आत्मा मानतो ते वास्तविक पाहता अहंभाव, मन किंवा बुद्धी ह्यापैकीच कुणाची तरी कल्पना असते. कोणत्याही संकल्पनेचा उदय हा ‘मी’ पणातूनच होतो. त्या मीपर्यंत पोहोचणे कठीण काम आहे कारण तो सतत असणारच आहे तो नष्ट होणे शक्य नाही. ‘दृष्टीम ज्ञानमयी कृत्वाम. ‘ आपल्या दृष्टीला ज्ञानमय करणे म्हणजे सगळीकडे समत्व आणि ब्रह्मत्व दिसेल. मात्र आपला दृष्टिकोन बाह्य झाल्याने बाहेरच्या वस्तूंवर टिकून असल्याने आपल्याला हे सगळं लक्षात येत नाही. पण दृष्टीला अंतर्मुख केल्याने.. आत अजून डोकावून बघितल्याने आपण केवळ आणि केवळ आत्मा आहो हे लक्षात येईल.

चोर जसा स्वतःलाच शोधून देणार नाही. तसं मनही शोधायला गेल्यावर ते स्वतःला शोधून घेणार नाही. नजरेसही पडणार नाही. कारण ते खोटं आहे. खोट्याचा शोध घेतला तर तो लागणारच नाही कारण ते आहेच नाही. तो एक भास असतो आपली तशी मान्यता असते. ह्यामुळे खरं असलेलं आत्मतत्त्व आपण हरवून बसलो आहे. म्हणून आत्म्याचा शोध घ्या.. मनावर राज्य करण्याचा तोच एक उपाय आहे. आणि तेच सत्य आहे.

आपण कागदावर लिहिलेले अक्षर वाचतो.. मात्र हे करत असताना केवळ अक्षरांवर आपले लक्ष असते त्याला आधार देणाऱ्या कागदावर नाही.. अगदी तसंच आपलं झालेला आहे.. आत्म्यावर असलेल्या मन आणि अहंभाव ह्यालाच आपण महत्त्व देत आहोत त्याला आधार देणाऱ्या आत्म्यावर कुणाचेही लक्ष नाही. ह्या दोष कुणाचा आहे ?आपलाच! जसं की एखाद्या कॅनव्हास वर चित्रकार अलग अलग चित्रे रेखाटतो देखावे काढतो. अगदी तसंच आपणही आपल्या मनपटलावर अनेक अनेक स्वप्निल चित्रे रंगवत असतो. ती नाहीशी होणारी असतात मात्र त्या मनपटलाला आधार देणारा.. पृष्ठभूमी देणारा कॅनव्हास.. आत्मा आपण विसरून जातो. आपण आत्म विचारात सलग्न असलं पाहिजे. तेव्हाच लोक विचार आपोआप निघून जाईल. अनात्म निघून जाईल. हाच खरा आत्मविचार आहे. आत्मा ह्या शब्दातच देह, मन, मनुष्य, व्यक्ती, परमात्मा, इत्यादी चा समावेश असल्याचे लक्षात येईल.

आपल्या मनात निर्माण होणाऱ्या भविष्याच्या चिंतेबद्दल.. संशयाबद्दल विचार करणाऱ्याला पकडल्यावर लक्षात येईल की आत्म्यामध्ये स्थिर नसल्याने आपण क्षुब्ध होत आहोत.. भुकेजलेलो आहोत. जगातल्या चिंता आणि समस्यांनी आपण ग्रासलेलो आहोत. हे केवळ आत्म्यापासून दूर गेल्याने होते. म्हणून जर तुम्ही आत्म्याशी दृढतेने टिकून राहिला.. जुळून राहिला तर सर्व समस्या नाहीशा होऊन जातील लुप्त होतील. अशाने मन हळूहळू त्याच्या सर्व मागण्या सोडून देईल आणि तुम्ही आत्म्यामध्ये शांतीने जगू शकाल राहू शकाल.

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भूक आणि मी… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 विविधा 🌸

☆ भूक आणि मी… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

दोन अक्षरी शब्द ज्यात सर्व विश्व व विश्वाचे गुपित दडले आहे. विश्व जसे अनादि अनंत आहे तशीच भूक पण अनादी अनंत आहे. किंबहुना जशी विश्वनिर्मिती झाली तशी भूक पण निर्माण झाली. मनुष्य, पशु पक्षी चर अचर ह्या जीव वैविध्यपूर्ण सृष्टीत भूक ही अशी गोष्ट आहे की त्यासाठीच सर्व जग राहाटी चालू होती, आहे, आणि राहील हे त्रिकालाबाधित सत्य आहे. जो जो प्राणी जन्माला आला तो तो जन्मजात भूक घेऊन आला. भूक आहे म्हणूनच सर्व काही आहे भुकेसाठीचा संघर्ष अबाधित चालू आहे.

“काय आहे ही भूक”. भूक ही अनेक प्रकारची आहेच, सरळधोटपणे जीवन जगताना जी ऊर्जा हवी ती शरीराला पुरवणारे अन्नघटक, पोटात घेऊन त्याचे रूपांतर शरीर अवयवात, शरीरवाढीसाठी करणे म्हणजेच शरीर पोषण करणे. आम्ही म्हणतो भूक पोटात लागते पण मित्रांनो भूक ही सर्व शरीररसरक्तादि अवयवांची भूक ही पोटातील अवयव, ज्याला आपण अन्नाशय किंवा आमाशय पुरवत असते.

सर्व प्राणीमात्रादी अन्नप्रकार हे वेगवेगळ्या पद्धतीने असले तरी सगळ्यांचं काम एकच भूक शमवणे व आपले अस्तित्व कायम राखणे, जीवित राहणे. जीवन जगण्याचा केलेला आटापिटा हा भुकेसाठीच असतो.

॥ अन्नपूर्णा ॥ 

।। अन्नपूर्णे सदा पूर्णे 

शंकर प्राण वल्लभे

ज्ञान वैराग्य सिद्धर्थम 

भिक्षां देहीच पार्वती ।।

वरील श्लोकात शंकराचार्य काय म्हणतात बघा… अन्नपूर्णा म्हणजेच साक्षात पार्वती. चक्क महादेवसुध्दा पार्वतीकडे भिक्षा मागतात. कुठल्या प्रकारची तर ज्ञान मिळण्यासाठी व वैराग्य प्राप्तीसाठी भिक्षा मागतात. भिक्षा म्हणजे भीक मागणे.

भीक कशासाठी तर पोट भरण्यासाठी नव्हे तर ज्ञान” व ज्ञानेश्वर” मिळवण्यासाठी. याचाच अर्थ मित्रानो भूक म्हणजेच मोह आहे, हा मोह साक्षात पार्वती आहे, तिच्याकडे. शरीरवाढीसाठीची भिक्षा भूक शमविण्यासाठी मागितली आहे.

किती प्रकारची भूक आहे.

शरीरासाठी आवश्यक अन्न!

14 विद्येसाठीची भूक !

64 कलेची भूक ही ! ज्ञानप्राप्तीसाठीची आहे

वैराग्य भूक ही सर्व आयुष्यातील टप्पे पार झाल्यावरची आहे.

भूक ही कलेसाठी,

भूक शरीर शय्यासुखासाठी’:

भूक शरीर रक्षणासाठी,

भूक ही ज्ञान, मिळविण्यासाठी

शेवटी भूक वैराग्य ! प्राप्तीसाठी 

म्हणजेच चारीही आश्रम मिळण्यासाठी आहे.

भूक मारणे म्हणजे उपवास. उपवास म्हणजेच अग्नी प्रदीप्त… अग्नी प्रदीप्त म्हणजेच सत्वगुण.. सत्वगुण म्हणजेच प्रकाश… प्रकाश म्हणजेच ज्ञान प्राप्ती…

बघा मित्रांनो आपण एवढया सगळ्या गोष्टी कुणाकडे मागतो आहोत तर अन्नपूर्णा म्हणजेच पार्वती म्हणजेच प्रकृती म्हणजेच स्त्री कडे. ह्या एवढया गोष्टी स्त्री म्हणजेच मोहाकडे आपण मागतो याचाच अर्थ भोगाकडून वैराग्याकडे !

मग मित्रांनो हाच निसर्गदत्त सिद्धांत आहे. हाच सिध्दांत ओशो रजनीश यांनी वेगळ्या पद्धतीने सांगितला. संभोगातून समाधीकडे…

पण पण पण

मित्रांनो असंही आहे की जे जन्मतः वैरागी आहेत ते कसे तर ते अवधुतच असतात. त्यांचा ज्ञान परिसीमा ही सत्वगुण प्रकाशितच असते, त्यांना भूक तहान इतर गोष्टीची आवश्यकता नसतेच. ते अवलिया असतात. सामान्य जनांनाच कैक प्रकारची भूक असते किंबहूना भूक आहे म्हणूनच जगातील इतर व्यवहार चालत असतात. ! लौकिक व अलौकिक भूक हेच खरे दोन प्रकार म्हणता येतील. सांख्य ह्या दर्शनशास्त्र प्रकारात काही सिध्दांत मांडले ते अभ्यासनीय आहेत.

भूक अनेक प्रकारची आहे हे खरंच, सर्व प्रकारची भूक ही जीवनात असणे यालाच तर आयुष्य म्हणतात, ज्ञानाचा सम्यक उपयोग करून भूक भागवणे हे ज्याच्या त्याच्या हातात आहे.

कोणती भूक ज्यास्त हाताळावी हे ज्यांनी त्यांनीच ठरवावे.

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नदी… ☆ सुश्री मानसी चिटणीस ☆

सुश्री मानसी विजय चिटणीस

? विविधा ?

☆ “नदी…” ☆ सुश्री मानसी विजय चिटणीस

समुद्र तहान थोडीच भागवतो? त्यासाठी हवी असते नदी.. मग ती कोणतीही असो.. प्रत्येक तहानेचं उत्तर नदीकडे असतं.. जोवर ती आटत नाही किंवा संपून जात नाही.. आपल्या प्रवाहात येणार्‍या प्रत्येकाला भिजवत, त्याची तहान भागवत नदी वाहत राहते. स्वत:चे तट, चौकटीत सांभाळते. आपल्यातील अमृताचा झरा ती रिकामा करते वर्षानुवर्ष, येणार्‍या पुढच्या प्रत्येक पिढीसाठी. हे नदीचे दायीत्व आहे की तिच्याकडे येणार्‍या प्रत्येकाला तिथे तृप्त करावे, सांभाळावे, प्रसंगी पोटात घ्यावे. पण नदीही आटते कधीकधी. पोटातले सारे विकार, भावना, साल यांचा गाळ साठत जातो. क्षणांचे थरावर थर साचत जातात आणि वाहती नदी साचायला लागते जागोजागी. तिची निर्मळता, स्वच्छता, शुचिता संपायला लागते आणि मग नदीचे डबके होते. या भावना तरी कशा असतात? सगळीकडून सारख्या वाहणार्‍या. असलाच तर थोडाफार किंचितसा इकडचा, तिकडचा फरक असेल कदाचित. या भावना काळसापेक्ष असतात बर्‍याचदा. काळ बदलेल तशा बदलतात. नदीही प्रवाह बदलतेच की पण तिचा प्रवाह बदलण्याची क्रिया खूप संथ होते. एखाद्या संसारात मुरत गेलेली बाई जशी कालांतराने शांत होते तशीच नदी खोल खोल होत जाते नाहीतर मग किनार्‍यांच्या चौकटी मोडते.

नदीलाही हवाच की पाण्याचा पुरवठा सतत प्रवाही राहण्यासाठी. नदी आटायला लागली की आपण पात्र खोल करतो. नदीचे झरे मोकळे करतो नदीला प्रवाहित करण्यासाठी.. आपल्या मनाचंही असचं असतं थोडफार. तुझं आहे तुजपाशी असं असताना आपण शोधत राहतो बाह्यजगात.. मग वाटत राहातं.. आधी होतं तेच चांगलं होतं

‘वक़्त बीतने के बाद अक्सर ये अहसास होता है…

कि, जो छूट गया वो लम्हा ज्यादा बेहतर था…. ‘

दुःख माणसाला जगण्याची सवौत्तम अनुभूती देतं, फक्त ते.. प्रवाहित करता यायला हवं. मला नेहमी वाटत बायका या नदीसारख्या असतात. कधी अल्लड झर्‍यासारख्या गात सुटलेल्या, कधी भावनांच्या दरीत स्वत:ला झोकून देणार्‍या धबधब्यासारख्या, साचलेल्या डोहासारख्या गहन आणि गूढ. कधी तारुण्याच्या अवखळ काठावर ; पाणी भरायला आलेल्या तरुणीसारख्या किंवा मग वेगाबौंड होत रस्त्यातले सारे खाच-खळगे पार करणार्‍या, वाटेतल्या दगड-धोंड्यांना स्वत:च्या प्रवाहासोबत वाहून नेणार्‍या, प्रसंगी रौद्ररूप धारण करून आपलं अस्तित्व दाखवणार्‍या, आसपासच्या परिसराला तृप्त करून… त्या हिरवाईला स्वतःच्या अंगावर दागिन्यांसारखे मिरवणार्‍या‍ या परिपक्व बाया कायम नदीसारख्याचं दिसतात मला..

अनेक कथा-कहाण्या स्वत:सोबत जगताना नदी, आपलेच काठ रुंदावत जाते. स्वत:च्या विचारांच्या कक्षा वाढाव्यात तशी आपली सारी निर्मळता काठांनी जपत राहते. एखाद्या युगाची पापनाशिनी होवून उद्धारत राहते पिढ्या न पिढ्या. नदी सामावून घेते तिच्याजवळ येणार्‍या प्रत्येकाला जशी आई आपले तान्हुले कुशीत घेते. किंवा मिठीत घेते तिच्यावर प्रेम करणार्‍याला प्रत्येकाला, तिच्या आसर्‍याला आलेल्या प्रत्येकाला. बाया पण तशाच तर असतात. जरी भावनांनी कोरड्या झाल्या तरी मधूनच त्यांना मायेचे उमाळे फुटतात आणि त्या वाहू लागतात अविरत. अशावेळी जाणवतो तो त्यांच्यातला मायेचा अथांग समुद्र. प्रत्येक बाई आपल्यात समुद्राचा उणापुरा एक तरी अंश जपतेच. बायका आणि नदी सारख्याच असतात सर्वार्थाने. आपल्यातले प्रवाहीपण जपताना दोघीही.. जिवंत रहात, खळाळत जगताना आपल्यातला समुद्र काही मरू देत नाहीत.

अशावेळी जिथे नदी समुद्राला जावून मिळते तिथे तिचा, तिच्या वाहण्याचा अंत होतो हे माहिती असूनही ती कोणत्या ओढीने समुद्राकडे धावते ? हे न उमजणारे कोडे आहे. का आहे हे नदीचे संपूर्ण समर्पण? नव्या जन्माच्या ओढीने की संपून जाणार्‍या प्रवाहाला जपण्यासाठी? काहीही असो ती जीवन संपवते हे निश्चित. हेच तर… आहेही आणि नाहीही… मनात रुजलेला क्षण सांभाळायचा, वाढवायचा, फुलवायचा आणि तो सरला की कृष्णार्पणमस्तू म्हणून पुढच्या क्षणाचं स्वागत करायचं. इतकं सोपं असतं जगणं? नदी होणं? आणि बाई ही होणं? 

 

© सुश्री मानसी विजय चिटणीस

केशवनगर, चिंचवड, पुणे. फोन : ०२०२७६१२५३१ / ९८८११३२४०७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares