मराठी साहित्य – विविधा ☆ – लोक काय म्हणतील..? – ☆ अलका ओमप्रकाश माळी ☆

अलका ओमप्रकाश माळी

?  विविधा ?

☆ – लोक काय म्हणतील..? – ☆ अलका ओमप्रकाश माळी ☆

कुछ तो लोग कहेंगे.. लोगों का काम है कहेना.. छोडो बेकार की बातों मे… बीत न जाये (रैना)… हे गाणं आजच्या विषयाला अगदी समर्पक आहे ना.. मनुष्य प्राणी समाजप्रिय आहे आणि ह्या समाजाचा मुख्य घटक म्हणजे लोक.. त्यामुळे आपल्या आयुष्यातील कित्येक निर्णय आपण लोक काय म्हणतील ह्याचा विचार करून घेत असतो.. पण हे कितपत योग्य आहे..? कोण आहेत हे लोक?

हे आपल्याला खरंच ओळखतात का?

– हे आपल्या संघर्षात सोबत होते का?

– हे आपलं सुख-दु:ख वाटून घेतात का?

हे तीन प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजेत अस मला वाटत.. आपले निर्णय जर लोक काय म्हणतील ह्यावर अवलंबून असतील तर ह्या प्रश्नांची उत्तर मात्र आपल्याकडे हवीत.. आणि ह्या प्रश्नांची उत्तर जर “नाही” अस असेल तर मग मात्र उडत गेले हे लोक म्हणाव आणि आपले निर्णय आपल्याला हवेत तसे घ्यावेत..

“लोक काय म्हणतील? ” हा प्रश्न आपल्याला अडवत असेल, तर हे लक्षात ठेवलं पाहिजे –

‘आपलं आयुष्य, आपले निर्णय, आपली जबाबदारी! ’

लोकांचं मत हा एक ट्रेंड आहे – ते दर मिनिटाला बदलतं.

पण आपल्या निर्णयाचा परिणाम आपल्यावर होतो – त्यामुळे जो भी करेंगे आपने लिये करेंगें.. मग जो होगा देखा जाएगा.. कोणताही निर्णय घेताना लोकांचा विचार करण्यापेक्षा आपल्या निर्णयांचे आपल्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहेत हे महत्वाचं असत.. लोकांच काय आहे उद्या लोक तेराव्याच जेवायला आल्यावर ही ऊन जास्त आहे मसाला ताक हव होत यार हे ही बोलून दाखवतील.. त्यामुळे लोगोको मारो गोली और मस्त जियो..

अपना हर दिन ऐसे जियो

जैसे कि आखिरी हो..

अस गाणं गुणगुणत मस्त आयुष्य जगायचं.. शेवटी काय जिंदगी एक पहेली है सुलझावो तो सुलझेगी और उलझावो तो उलझेगी.. म्हणून लोगोंका काम है कहेना म्हणायच आणि चालत रहायचं.. फारच लोक मागे लागले तर आपण पाठमोर होऊन एक झक्कास सेल्फी घ्यायची की मग सगळे आपल्याकडे बघतात आणि खुशी खुशी हसतात.. सो चला तर जलने वालोंको और जलाओ और खुद जी भर के जियो…

अपनी लाइफ अपने रूल..

बाकी सबको जाओ भूल..

 

© अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वस्तू वस्तू जपून ठेव – ५ – टिक टिक -☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ वस्तू वस्तू जपून ठेव – ५ – टिक टिक – ☆ विभावरी कुलकर्णी

सध्या लहानमुलांसाठी खूप आकर्षक म्हणजे अगदी मोठ्या माणसांना सुद्धा भुरळ पडावी अशी खेळणी दिसून येतात. ती खूप महाग पण असतात. काही खेळणी ज्ञान वाढवणारी असतात. परंतु साधारण चाळीस वर्षांपूर्वी एक लोकप्रिय असलेले खेळणे मला आठवते. त्याची किंमत असेल दहा किंवा पंधरा पैसे. पण मुलांच्या दृष्टीने उपयुक्त! त्याचे नाव टिक टिक किंवा टीन क्लिकर

 ​या वस्तूला ‘कडकडी’ सुद्धा म्हटले जाते. इंग्रजीत याला ‘Metal Clicker’ किंवा ‘Cricket’ असेही नाव आहे. ​खेळणी म्हणून: ८० च्या दशकातील मुलांचे हे सर्वात आवडते आणि स्वस्त खेळणे होते. अंगठ्याने तो धातूचा पत्रा दाबला की ‘कडक’ असा आवाज येतो, म्हणून मुले याचा वापर गंमत म्हणून किंवा एकमेकांना खुणावण्यासाठी करत असत.

​फार कमी लोकांना माहीत आहे की, अशा प्रकारच्या क्लिकरचा वापर दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन सैनिकांद्वारे (विशेषतः पॅराट्रूपर्स) रात्रीच्या वेळी अंधारात एकमेकांना सांकेतिक संदेश देण्यासाठी केला जात असे. एकदा ‘क्लिक’ केल्यास उत्तर म्हणून दोनदा ‘क्लिक-क्लिक’ करणे, ही त्यांची ओळख पटवण्याची पद्धत होती.

निर्मिती

​हे खेळणे लवचिक स्प्रिंग स्टील (Spring Steel) किंवा कथील (Tin) च्या पातळ पत्र्यापासून बनवले जाते.

​एका छोट्या धातूच्या चौकटीत किंवा डबीत हा पत्रा अशा प्रकारे बसवलेला असतो की तो थोडा फुगीर राहतो.

​ जेव्हा आपण या पत्र्यावर दाब देतो, तेव्हा तो आपला आकार बदलतो आणि पुन्हा मूळ स्थितीत येताना हवेच्या दाबामुळे एक विशिष्ट ‘टीक’ आवाज निर्माण होतो. सुरुवातीला हे अगदी साधे पत्र्याचे असायचे. कधीकधी तो पुढचा पातळ पत्रा हाताला लागायचा. किंवा ते खिशात ठेवले की पत्र्याच्या टोकामुळे खिशाला छिद्र पडायचे. पण कोणालाही कळू न देता मित्रांना संकेत द्यायला उपयोगी होते.

मुले फक्त मजेसाठी हा आवाज काढत असत.

​खेळताना (उदा. लपाछपी किंवा पकडापकडी) एकमेकांना दूरून संकेत देण्यासाठी किंवा बोलावण्यासाठी याचा वापर व्हायचा.

​ गाणी म्हणताना किंवा ठेक्यावर वाजवण्यासाठी मुले याचा वापर करत.

​ काही मुले हे आपल्या सायकलच्या हँडलला लावून बेलसारखा वापर करायची.

नंतर या साध्या दिसणाऱ्या टिकटिकला आकर्षक रंग लावून किंवा काही प्राण्यांचे आकार देऊन रंगीबेरंगी करुन आकर्षक केले गेले.

याच्या आवाजाच्या मदतीने कुत्र्यांना प्रशिक्षण दिले जात होते.

​हे खेळणे आता दुर्मिळ झाले असले तरी, आजही जत्रेत किंवा जुन्या वस्तूंच्या दुकानात पाहायला मिळते.

© विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मनकवडा राम… आत्माराम… ☆ अपर्णा परांजपे ☆

अपर्णा परांजपे

🌳 विविधा 🌳

☆ ✍️ मनकवडा राम… आत्माराम… ☆ अपर्णा परांजपे

ब्रह्म वाक्य आहे हे असं जर मी म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही याची खात्री आहे!

मुळात हे आत्मचिंतन असल्याने स्व वर केंद्रित आहे. बुद्धी ही दोन प्रकारची आहे.

१ देहबुद्धी (अज्ञान, मर्यादित बुद्धी)

२: आत्मबुध्दी (ज्ञान, अंतिम सत्य)

मग पहिला स्व जाणणारी बुध्दी समजून उमजून बदलवून दुसऱ्या स्व मध्ये प्रतिष्ठित करणे सोपं कसं असेल? म्हणून सगळा गोंधळ, अस्वस्थता, अस्पष्टता असते हे खरे, हे “जीवाचे” लक्षण आहे. पण

जीव जीवच राहून सुखी झाला असता तर सगळे प्रश्न मिटले असते. मर्यादित रुप हे अमर्याद स्वरूपाचा अंश असल्याने त्याची तळमळ शांत होत नाही व खरे समाधान मिळत नाही, जोपर्यंत तो स्वतः अमर्याद होत नाही. हाच अमर्याद स्व म्हणजे दुसरा स्व!

दुसरा स्व ही आपणच आहोत फक्त पहिला स्व ओळखून नव्या स्व ची ओळख धारण करणे ही ” घटना घडणे” म्हणजे खरा चमत्कार आहे.

देह रूपाने जन्म मिळाला हाही चमत्कारच आहे पण तो दृश्य आहे. या देहाचा आधार, चैतन्य म्हणजे आत्मा त्या आत्म्याचे स्वरूप परमात्म्याचा अंश आहे, हे जाणवणे म्हणजे “जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा” या महावाक्याचा स्वानंद अनुभवणे आहे! म्हणून हा खरा “दैवी चमत्कार” आहे!

मर्यादित रुपात स्वतः प्रतिष्ठित झालेला आत्माराम ओळखण्यासाठी त्याचीच माया अडथळा करते, परीक्षा घेते, जे आवश्यक आहे सगळे मनाचे खेळ उघड करते व मनाला स्व कडे वळवते. जीवनानुभव घेत घेत, सत्संग, सत्संगती, सद्ग्रंथ सापडणे ही सद्गुरू कृपा आहे. मार्गदर्शन मिळाल्याशिवाय मार्ग कळणार कसा?

 वेगवेगळ्या पध्दतीने दुसऱ्या स्व ची ओळख व्हावी असा प्रयत्न स्वतः सद्गूरु करतात हीच त्यांची कृपा आहे. आत्मनिष्ठ सद्गूरु च आत्म्याची ओळख करून देतात. मग मर्यादित स्व अमर्याद स्व मध्ये परिवर्तित होतो. महादेव हे देवांचे देव आहेत. त्याच्या मुखातून आलेली कथा पार्वती मातेसोबत शुकाने श्रवण केली व अमरत्व प्राप्त झाले. अश्या गोष्टी जीवनाचा आधार ठरतात.

रामाशिवाय शिव नाहीत

शिवाशिवाय राम नाहीत…

भगवान शंकरांचे जीवन बघितले तर..

भगवान शंकरांना ‘देवाधिदेव’ महादेव म्हटले जाते. महादेवांचे एक रूप तांडव करणाऱ्या ‘नटराजा’चे आहे, तर दुसरे रूप एका महान ‘महायोगी’चे आहे. ही दोन्ही रूपे रहस्यांनी भरलेली आहेत. शिवशंभूंना ‘भोलेनाथ’ असेही म्हणतात. जिथे एकाच व्यक्तिमत्त्वात इतके विविध पैलू आहेत, तिथून आपण आपल्या जीवनासाठी प्रेरणा नक्कीच घेऊ शकतो.

वाईटाचा नाश करणे

ब्रह्मा हे उत्पत्तीसाठी आणि विष्णू हे सृष्टीच्या रचनेसाठी ओळखले जातात, तर शिव हे विनाशासाठी ओळखले जातात. शिवाचे हे रूप कदाचित भीतीदायक वाटू शकते, परंतु प्रगतीसाठी एखाद्या वाईट गोष्टीचा किंवा अनिष्ट प्रथांचा नाश होणे अत्यंत आवश्यक असते. शिव याच परिवर्तनासाठी ओळखले जातात.

शांत राहून स्वतःवर नियंत्रण मिळवणे

शिवापेक्षा मोठा कोणीही योगी झालेला नाही. एखाद्या परिस्थितीत स्वतःला गुंतवून न घेता, अलिप्त राहून त्या परिस्थितीवर पकड ठेवणे सोपे नसते. महादेव एकदा ध्यानाला बसले की संपूर्ण जग इकडे-तिकडे झाले तरी त्यांचे ध्यान कोणीही भंग करू शकत नाही. शिवाचे हे एकाग्र रूप आपल्याला जीवनातील गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यास शिकवते.

नकारात्मक गोष्टींना सकारात्मकतेने स्वीकारणे

समुद्रमंथनातून जेव्हा विष बाहेर आले, तेव्हा ते पिण्याची कोणाचीही तयारी नव्हती. अशा वेळी महादेवांनी स्वतः ते विष (हलाहल) प्राशन केले आणि त्यांना ‘नीलकंठ’ हे नाव मिळाले. या घटनेतून हा मोठा धडा मिळतो की, आपणही जीवनातील नकारात्मक गोष्टी पचवून घ्याव्यात, पण त्याचा परिणाम ना स्वतःवर होऊ द्यावा, ना इतरांवर.

जोडीदाराबद्दल आदर

हिंदू मान्यतेनुसार महादेव हे एक आदर्श जोडीदार मानले जातात. जर पार्वतीने त्यांना प्राप्त करण्यासाठी वर्षानुवर्षे तपश्चर्या केली, तर शिवानेही त्यांना आपली ‘अर्धांगिनी’ बनवून पूर्ण सन्मान दिला. म्हणूनच ३३ कोटी देवांमध्ये केवळ शिवांनाच ‘अर्धनारीश्वर’ म्हटले जाते.

सदैव समान भाव ठेवणे

शिवाचे संपूर्ण रूप पाहिले तर असा संदेश मिळतो की, ज्या गोष्टी आपण साध्या डोळ्यांनी पाहणेही टाळतो, त्या त्यांनी सहज स्वीकारल्या आहेत. म्हणूनच त्यांच्या लग्नाला भूतांची टोळी आली होती आणि अंगाला राख लावलेल्या भोळ्यानाथांच्या गळ्यात साप लटकलेला असतो. वाईट कशातच नसते, फक्त एकदा तुम्हाला ते स्वीकारता आले पाहिजे.

 तिसरा डोळा उघडणे

शिवांना ‘त्र्यंबक’ म्हटले जाते कारण त्यांना तिसरा डोळा आहे. तिसरा डोळा म्हणजे बोध किंवा अनुभूतीचा एक वेगळा आयाम (Dimension) खुला होणे. दोन डोळे फक्त भौतिक जग पाहू शकतात, पण तिसरा डोळा अंतर्मनात पाहतो. या ज्ञानामुळे तुम्ही जीवनाकडे पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकता. त्यामुळे कोणत्याही ठरवलेल्या वाटेवर चालण्यापूर्वी स्वतः विचार करा आणि गोष्टी समजून घ्या.  

स्वतःचा मार्ग स्वतः निवडणे

शिवांची जीवनशैली असो वा त्यांचे कोणतेही अवतार, ते प्रत्येक रूपात पूर्णपणे वेगळे आहेत. मग ते तांडव करणारे नटराज असोत, विष प्राशन करणारे नीलकंठ असोत, अर्धनारीश्वर असोत किंवा लवकर प्रसन्न होणारे भोलेनाथ असोत. ते प्रत्येक रूपात जीवनाला एक योग्य दिशा दाखवतात.  

आपली ग्रंथसंपदा अथांग आहे! त्यातील एखादा कण जरी वेचता आला व त्याची प्रचिती घेण्यासाठी बुद्धी चा निश्चय झाला व तसे आचरण करता आले तर आणि तरच मानवी जीवनाचे कल्याण आहे म्हणून च चिंतन केले

मनकवडा राम… आत्माराम त्याचच खरा आधार व साक्षीदार ही तोच!

जे घडतंय व घडेल ते त्याच्या कृपेने घडणार तर मायिक शब्दांना काय स्थान?

भगवंत हृदयस्थ आहे 🙏

कृतज्ञ मी कृतार्थ मी 🙏

©  अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “श्रद्धा आणि विश्वास” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “श्रद्धा आणि विश्वास☆ श्री जगदीश काबरे ☆

“श्रद्धा” आणि “विश्वास” हे शब्द रोजच्या बोलण्यात अनेकदा परस्परांना पूरक म्हणून वापरले जातात; परंतु त्यांच्या आशयात मूलभूत फरक आहे. भाषाशास्त्रीय आणि तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर “विश्वास” हा प्रामुख्याने अनुभव, पुरावा, तर्क आणि पुनर्परीक्षण यांवर आधारलेला असतो; तर “श्रद्धा” ही भावनिक, सांस्कृतिक किंवा धार्मिक संदर्भातून निर्माण झालेली अंतर्मनाची बांधिलकी असते. विश्वास हा एखाद्या विधानाबद्दलचा स्वीकार असतो, जो उपलब्ध माहितीवर उभा असतो. उदाहरणार्थ, सूर्य पूर्वेकडूनच उगवतो हा विश्वास आपण पूर्वानुभव आणि वैज्ञानिक स्पष्टीकरणांवरून ठेवतो. परंतु एखाद्या देवतेवर, गुरुवर किंवा ग्रंथावर असलेली निष्ठा (येथे बरेचदा लोक विश्वास हा शब्द वापरतात) ही बहुधा श्रद्धेच्या चौकटीत येते; ती अनुभवापेक्षा परंपरेवर आणि भावनिक नात्यावर अधिक आधारित असते.

विश्वासाचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे त्याची परिवर्तनीयता. एखादी गोष्ट खरी आहे असे आपण मानतो; परंतु नवे पुरावे, संशोधन किंवा अनुभव आपल्याला दाखवतात की ती गोष्ट चुकीची आहे, तर आपला विश्वास बदलतो. विज्ञानाचा संपूर्ण प्रवास याच तत्वावर उभा आहे. विज्ञानात कोणताही सिद्धांत अंतिम नसतो; तो नव्या प्रयोगांनी, नव्या माहितीने तपासला जातो. म्हणूनच विश्वास हा परिवर्तनीय असतो… तो वाढतो, बदलतो, कधी मोडतो, तर कधी अधिक बळकट होतो. ज्यावर आपला विश्वास आहे त्याला प्रश्न विचारणे हा त्याचा अपमान नसतो; उलट ती त्याची शक्ती असते. कारण प्रश्नांच्या कसोटीवर टिकणारा विश्वासच खरा ठरतो.

याच्या उलट श्रद्धेचे स्वरूप बहुतेकदा अपरिवर्तनीय असते. अनेक धर्मसंस्थांमध्ये किंवा परंपरांमध्ये श्रद्धेची चिकित्सा करणे म्हणजे पाप किंवा अवमान मानला जातो. परिणामी श्रद्धेला प्रश्न विचारण्याची मुभा नसते. ती तपासली जाऊ नये, बदलली जाऊ नये, अशी मानसिक चौकट तयार केली जाते. अशा वातावरणात श्रद्धा ही स्थिर, अपरिवर्तनीय आणि अंध स्वरूप धारण करते. श्रद्धेचा पाया भावनिक असतो; म्हणून ती तर्काच्या कसोटीवर टिकली नाही तरी टिकवून धरली जाते. एखादी गोष्ट चुकीची आहे हे कळूनही “माझी श्रद्धा आहे” या कारणाने ती सोडली जात नाही. म्हणूनच विश्वास आणि श्रद्धा यांतील मुख्य भेद म्हणजे बदल स्वीकारण्याची तयारी आहे की नाही हा आहे. विश्वास हा सत्याच्या शोधात असतो. तो सत्य सापडल्यावर आपले रूप बदलतो. श्रद्धा मात्र सत्यापेक्षा स्थैर्याला महत्त्व देते. विश्वास म्हणतो, “मला पटते, पण जर चुकीचे ठरले तर मी बदलेन. ” श्रद्धा म्हणते, “मला पटते, आणि तेच अंतिम आहे. ” या दोन भूमिकांतील फरक लक्षात घेतला तर समाजातील अनेक वादांची मुळे स्पष्ट होतात.

याचा अर्थ श्रद्धा नेहमीच नकारात्मक असते असे नाही. ती व्यक्तीला मानसिक आधार, प्रेरणा आणि धैर्य देऊ शकते. पण जेव्हा श्रद्धेला प्रश्नांपासून दूर ठेवले जाते, तेव्हा ती विचारस्वातंत्र्यावर मर्यादा आणते. म्हणूनच मी असे नेहमी म्हणतो की, ज्या श्रद्धा चिकित्सेला नकार देतात त्या सगळ्या अंधश्रद्धाच असतात. सर्वसाधारणपणे प्रत्येक वेळेला असे निदर्शनास आलेले आहे की, कोणत्याही धर्मातील श्रद्धा ही चिकित्सेला नकारच देत असते म्हणून प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते. विश्वास मात्र व्यक्तीला संशय, शोध आणि आत्मपरीक्षणाची सवय लावतो. म्हणूनच विचारशील समाज घडवायचा असेल, तर विश्वासाच्या परिवर्तनीय स्वभावाला मान्यता देणे आणि श्रद्धेलाही प्रश्नांच्या प्रकाशात पाहण्याची तयारी ठेवणे आवश्यक आहे. श्रद्धा आणि विश्वास यांचा हा सूक्ष्म पण मूलभूत फरक ओळखला, तर वैचारिक प्रगल्भतेकडे एक मोठे पाऊल टाकता येईल.

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भगिनी निवेदिता ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

? विविधा ?

☆ भगिनी निवेदिता ☆ शालिनी जोशी

भगिनी निवेदिता

 जी स्वतःचा उल्लेख ‘ रामकृष्ण- विवेकानंद यांची निवेदिता’ असा करत असे, ती स्वामी विवेकानंदांची मानस कन्या म्हणजे मार्गारेट एलिझाबेथ नोबल. यांचा जन्म २८ ऑक्टोबर १८६७ रोजी उत्तर आयर्लंड मध्ये झाला. वडील सॅम्युएल आणि आई मेरी यांचे हे पहिले अपत्य. कुटुंब धार्मिक, सात्विक व सुशील होते. मेरी नोबेलने इतर अनेक धर्मशील स्त्रियांप्रमाणे मनात प्रार्थना केली होती, ‘ ईश्वरा, माझं बाळ सुखरूप जन्माला आलं तर तुला अर्पण करीन’. ती प्रतिज्ञा खरी ठरली. मार्गारेटने आपले जीवन भारतीय समाजाच्या सेवेसाठी अर्पण केले. आपले सद्गुरु विवेकानंद यांचे कडून निवेदिता म्हणजे ‘जीवन समर्पित केले आहे अशी’ हे अभिधान प्राप्त केले.

 मार्गारेट यांचे प्राथमिक शिक्षण मँचेस्टर येथे झाले. वडिलांच्या निधनानंतर लंडन येथे शिक्षिका म्हणून काम करू लागल्या. हसतहसत बालशिक्षण या शिक्षण पद्धतीचा सखोल अभ्यास करून १८९२ मध्ये नव्या शिक्षण पद्धतीने शिक्षण देणारी शाळा सुरू केली. १८९४ मध्ये क्रांतिकारकानी स्थापन केलेल्या सिनफेन या पक्षाचे सदस्यत्व स्विकारले. १८९३ च्या सर्वधर्म परिषदेनंतर विवेकानंदांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. १८९६ मध्ये लंडन येथे विवेकानंदांची व्याख्याने त्यांनी ऐकली. त्यांना सद्गुरु मिळाले. स्वामी विवेकानंदांच्या कार्यात भाग घेण्यासाठी १८९८ मध्ये निवेदिता भारतात आल्या.

 भारतात त्या कलकत्ता येथे राहिल्या. हिंदू चालीरीती परंपरा समजावून घेतल्या. रामकृष्ण परमहंसांच्या पत्नी शारदादेवी यांची भेट घेतली. हिंदू धर्म स्वीकारला. हिंदुस्थान हेच कार्यक्षेत्र निश्चित केले. १८९८ मध्ये ब्रह्मवादीनी व्रताची दीक्षा घेतली. इंग्लंडकडून भारताला मिळालेली अमोल देणगी, असा विवेकानंद निवेदिताचा उल्लेख करत. हिंदू पुराणांचा व ग्रंथांचा अभ्यास निवेदिताने केला. विवेकानंदांच्या बरोबर सर्वत्र त्या जात. १८९८ मध्ये आलेल्या प्लेगच्या साथीत स्वामीजी व इतर शिष्यांबरोबर रोगग्रस्तांची सेवा त्यांनी केली. स्वच्छता केली व त्याचे महत्त्व लोकांना पटवून दिले. वेदांतील निष्काम कर्मयोग आचरणात आणला. बंगालच्या दुष्काळात लोकांना मदत केली. बालिका विद्यालय सुरू केले. त्याचे उद्घाटन शारदा देवीनी केले. बालविवाहित व अनाथ स्त्रियांना स्वावलंबी बनवण्यासाठी घरगुती उद्योगांबरोबर आणि भूगोल, इतिहास, गणित हे विषय शिकवले. जेणेकरून स्त्रिया सर्व अंगानी कर्तबगार व्हाव्या. बालिका विद्यालयातील तीन मुलींची संख्या ३० झाली. स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यासाठी मातृमंदिराची स्थापना केली. व्याख्याने, लेखन करून सत् मार्गाने मिळवलेला पैसा या कार्यात खर्च केला. मी हिंदू आणि सर्व स्त्रिया माझ्या मुली हा त्यांचा भाव होता. गरजवंताला मदत हे ध्येय होते. त्यामुळे लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला. त्या सर्वांच्या भगिनी झाल्या.

 स्वातंत्र्य चळवळीतही त्यानी सहभाग घेतला. हे रामकृष्ण मिशनच्या विचाराविरुद्ध होते म्हणून काही काळ ते काम थांबवले. लेखन, भाषण द्वारे स्वदेशी चळवळीत सक्रिय भाग घेतला. स्वामी विवेकानंद यांच्या निधनानंतर त्यांचा कसोटीचा काय होता. पण हाती घेतलेले काम सुरू ठेवण्याचा त्यांनी निश्चय केला. बंगालच्या विभाजनाला इंग्रजांना निषेध केला. अशीही अद्वितीय प्रतिभावंत स्त्री विवेकानंदांच्या परिश्रमाने भारतीयत्वात पूर्ण विलीन झाली. मी विवेकानंदांची मानसकन्या जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांची विस्मृती लोकांना होऊ देणार नाही. असा पण त्यांनी केला होता. निवेदितांचे जहाल विचार, ब्रिटिश सरकार विरुद्धच्या हालचाली, युवकांच्या मनात स्वातंत्र्याबद्दल आस निर्माण करणे या कार्यामुळे ब्रिटिश गुप्तहेरांची पाळत त्यांच्यावरती राहू लागली होती. युवकांसमोर आपल्या राष्ट्राचे चिन्ह असावे या भावनेने वज्राचे चिन्ह असलेला ध्वज तयार केला. तरुणांनी परदेशी जाऊन प्रशिक्षण घ्यावे ही कल्पना मांडली व अमलात आणली. परदेशातील क्रांतिकारी चळवळीची ग्रंथसंपदा भारतीय तरुणांना मिळवून दिली. जगदीशचंद्र बसू (वनस्पती शास्त्रज्ञ), रवींद्रनाथ टागोर, त्यांचे बंधू अवनीन्द्रनाथ, अरविंद घोष, बंगाली इतिहासतज्ञ रमेशचंद्र दत्त या सर्वांशी त्यांचे संबंध चांगले होते. त्यांनी बरेच ग्रंथ व लेख लिहिले. हिंदू संस्कृती आणि समाज पद्धती याविषयीचा त्यांचा ग्रंथ गाजला.

 १३ ऑक्टोबर १९११ रोजी त्यांनी इहलोकाचा प्रवास संपवला. त्यांचे अखेरचे वाक्य होते, ‘ मी आता चालले तरी भारतात ध्येयसूर्याचा उदय मी पाहिनच पाहिन. ‘ त्यांचे कार्य आणि शेवटचे वाक्य युवकांना प्रेरणादायी असेच आहे.

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १४ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १४ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

परमेश्वराशी तादात्म्यता-१

मागील भागात स्वतः तुकाराम महाराज निःसंग होऊन लोकांनाही भवभया पासून मुक्त होण्यासाठी कसे सावध करीत होते हे आपण पाहिले. एकदा जीवनात निःसंगता आली की द्वैतभाव नष्ट होऊन परमेश्वराशी तादात्म्यता कशी येते याविषयी गाथेतील काही अभंग घेऊन आपण या भागात विवेचन करूया.

शरणागत भक्तांना तुकाराम महाराज काय सांगत आहेत?

ब्रह्मादीक जया लाभासी ठेंगणे/

बाळीये आम्ही भले शरणागत//१//

ते भक्तांविषयी आणि स्वतः विषयी बोलत आहेत. ब्रह्मादीकांना सुद्धा जो लाभ होऊ शकत नाही, ते त्यासाठी ठेंगणे, तोकडे पडतात तो लाभ देवाला शरण आलेल्या आम्हा भक्तांना अगदी सहज होतो. त्याचे कारण काय? तर

 कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ/

 झाला पद्मनाभ सेवाऋणी//२//

आम्ही कामना, वासनांचा त्याग केल्यामुळे आम्हाला भजनाचा लाभ झाला आहे आणि आमच्याकडून होणाऱ्या या सेवेसाठी प्रत्यक्ष विष्णू सुद्धा आमचा ऋणी झाला आहे.

परमेश्वराला प्रसन्न करण्याचे भजन हे फार प्रभावी साधन आहे.

 कामधेनुच्या क्षीरा पार नाही/

 इच्छितचिये वाही वरुसावे//३//

या ठिकाणी महाराजांनी कामधेनूचे रूपक वापरले आहे. कामधेनूचे दूध कधीही न आट णारे असते. या सर्व संत मंडळींची हरी म्हणजे कामधेनू आहे. जेवढ्या आमच्या हरिभक्तीचा जोर मोठा तेवढा या धेनूचा पान्हा सकस आणि सरस!

 हरी नाही आम्हा विष्णुदासा जगी/

 नारायण अंगी विसावला//४//

आम्हाला बसल्या जागी परिपूर्णत्व आले आहे. आता आमच्या ठिकाणी ध्याता, ध्यान, आणि ध्येय असा भेद राहिला नाही. नारायण आमच्या अंगी विसावला आहे अर्थात आम्ही अद्वितीय ब्रह्मरूप झालो आहोत.

 शेवटी याच अभंगात महाराज सांगतात,

 तुका करी जागा/ नको वासपू वाउगा/

 आहेस तू अंगा/ अंगी डोळे उघडी//५//

प्रत्यक्ष भगवंत हृदयात स्थिर झाल्यामुळे, नारायणमय झाल्यामुळे आम्ही भक्तजन अत्या- नंदाच्या भोजनाचा आस्वाद घेत आहोत. वासनाक्षयामुळे आम्हाला पुनर्जन्म नाही. नारायण स्वरूपाशी तादात्म्यभाव हे या अवस्थेचे रूप आहे.

निजरूप विसरून तुकाराम महाराज झोपी गेलेल्याला जागे करतात. त्याला सांगतात की तू भिऊ नकोस. अद्वैतरूपी हरी तुला सापडेल कारण तू स्वतःच अंगाने तो आहेस, परमात्मा रूप आहेस. जेव्हा तू तुझी आत्मिकदृष्टी उघडून पाहशील तेव्हा तुला त्याचे ज्ञान होईल.

एकात्मतेचे दुसरे उदाहरण या अभंगातून पहा.

 माया तेची ब्रह्म ब्रह्मतेची माया/

 अंग आणि छाया जया परी//

आपले शरीर आणि सावली ही जशी वेगळी नसतात, त्याचप्रमाणे माया आणि ब्रह्म या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. जरी या दोन वेगळ्या गोष्टी भासल्या तरी तत्वतः त्या एकच आहेत. छाया कोणत्याही शस्त्राने तुटत नाही. हाताने तिला दूर सारता येत नाही. जमिनीवर लोटांगण घातले तरी ती वेगळी न होता आपल्या अंगाखाली दिसेनाशी होते. आपण उंच झालो तर ती उंच होते, वाकलो तर ती आपल्याबरोबर लवते.

*

आता केशी राजा हेची विनवणी/

 मस्तक चरणी ठेवीतसे//१//

*

देह असो माझा भलतीये ठाई/

 चित्त तुझ्या पायी असो द्यावे//२//

*

काळाचे खंडण घडावे चिंतन/

 तन मन धन विन्मुखता//३//

*

कफ वात पित्त देह अवसाने

 ठेवावी वारुनी दुहिते ही//४//

*

सावध तो माझी इंद्रिय सकळ/

 दिली एक वेळ हाक आधी//५//

*

तुका म्हणे तू या सकळाचा जनिता/

 येथे ऐक्यता सकळांसी//६//

*

इथे परमेश्वराला उद्देशून महाराज म्हणतात,

“हे केशवा, तुझ्या पायांवर मस्तक ठेवून मी तुला विनंती करतो की, माझा देह कुठेही असो, पण चित्त मात्र तुझ्या ठिकाणीच असावे. देह, मन, द्रव्य याचा मोह नष्ट होऊन अखंड तुझ्याच चिंतनात माझा सर्व वेळ खर्च व्हावा. कफ, वात, पित्त या त्रिदोषांचे माझ्या अंतकाळी निवारण व्हावे. जोपर्यंत माझी सर्व इंद्रिये सावध आहेत तोपर्यंत मी तुम्हाला साद घालून वर्तमान परिस्थिती निवेदन करीत आहे. “

सामान्य जन मूढ आहेत, त्यांना परब्रम्ह स्वरूपात द्वैतभावना नाही हेच मुळी समजत नाही. त्यांना तारण्यासाठी भक्तीचे महात्म्य पटवून देणे आवश्यक आहे. तुकाराम महाराज त्यांच्या मनातील हे विचार खालील अभंगात सांगत आहेत.

 याजसाठी भक्ती/ जशी रुढवावया ख्याती/

 नाही तरी कोठे दुजे/ आहे बोलावया सहजे/

 गौरवावयासाठी/ स्वामी सेवेची कसोटी/

 तुका म्हणे अळंकारा/ देवभक्त लोकी खरा//

लोकांमध्ये भक्तीचा गौरव होण्यासाठी स्वामी, सेवक आणि सेवेची कसोटी या गोष्टी येतात. लोकांमध्ये देव आणि भक्त यांचे वरवरचे द्वैत हे भूषण आहे, अलंकाराप्रमाणे आहे. या सगूण भावातूनच हळुहळू जनसामान्यात एकरूपता येते.

ईश्वराशी महाराजांची संपूर्ण तादात्म्य पावलेली अवस्था या अभंगात ते वर्णितात.

 काहीच मी नव्हे कोणीये गावीचा/

मी कोणीच नाही. मला ना नाव ना गाव. जागच्या जागी असणारे जे एकमेव ब्रह्म आहे तेच मी आहे.

*नाही जात कोठे येत फिरोनिया/ मी कोठे जात नाही की मी परत येत नाही.

 नाही मज कोणी आपले दुसरे/

 कोणाचा मी खरे काही नव्हे//

 मी कोणाचा नाही, माझे कोणी नाही, माझ्यात आप-परभाव नाही.

 नाही आम्हा जावे मरावे लागतं/

 अहो अखंडित जैसे तैसे//

आम्ही जगत नाही की मरत नाही, कायम जसेच्या तसे राहतो.

 तुका म्हणे नामरूप नाही आम्हा/

 वेगळा या कर्मा-अकर्मासी//

आम्हाला रूप नाही, नाव नाही, कर्म-अकर्म यापासून आम्ही वेगळे आहोत.

 परमेश्वराशी एकरुपता म्हणजे काय हे आपल्याला तुकारामांच्या या अवस्थेतून स्पष्ट होते.

क्रमशः… १४ 

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ९८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ९८ ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र- माझी स्वेच्छानिवृत्ती आणि त्याचे मंजुरीपत्र हे विषय माझ्यापुरते मी पुसूनच टाकले होते. पण ते खोटं ठरवणारं, मला अचंबित करणारं वास्तव वखरेसाहेबांच्या केबिनमधे माझी वाट पहातेय याची मला पुसटशीही कल्पना नव्हती.

 आज इतक्या वर्षांनंतरही त्यातला थरार मी विसरू शकलेलो नाहीय.

 मी त्यांच्या केबिनमधे जाताच वखरेसाहेबांनी माझं हसतमुखानं स्वागत केलं होतं.

 “यु आर व्हेरी लकी मिस्टर लिमये. गेम वॉज व्हेरी टफ. बट यू हॅव वन इट.” ते म्हणाले होते.)

आज दिवसभर काय घडत होतं ते त्यांच्याकडून ऐकताना माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना. ‘अतर्क्य’ म्हणजे काय याचा प्रत्यय मला प्रत्येक क्षणी येत होता. सहजासहजी घडूच न शकणारं बरंच कांही दिवसभरात घडून गेलं होतं !!

माझ्या कथासंग्रहाचा प्रकाशन समारंभ, त्यात व्यत्यय आणण्यासाठीच अचानक ठरली असावी अशी आमच्या जी.एम्. मॅडमची ती व्हिजीट, त्यादरम्यान मॅडमनी सूतोवाच केलेली नव्याने येऊ घातलेली ‘स्वेच्छानिवृत्ती’ची गोल्डन शेकहॅंड स्कीम आणि त्याच अनुषंगाने माझ्या आयुष्यांत येऊ पहाणारी अनोखी वळणं न् पुढे त्यात प्रत्येकवेळी निर्माण होत गेलेली अनिश्चितता…!

वखरेसाहेब सांगत होते ते ऐकताना हे सगळंच अधांतर अतिशय अनपेक्षितपणे हळूहळू विरून गेलंय असंच मला वाटतं राहिलं. कारण जे घडलं होतं ते अतिशय अनपेक्षित आणि नेमकं मला हवं तसंच!!

आज पंचवीस वर्षं उलटून गेल्यानंतरही त्या संध्याकाळचे ते क्षण मी विसरूच शकत नाहीय.माझ्या अनोख्या भविष्यकाळासाठी माझ्या संपूर्ण आयुष्यालाच सकारात्मक कलाटणी देणारी ती संध्याकाळ माझ्यासाठी उर्वरीत आयुष्यातली नवी पहाटच ठरली होती..!

वखरेसाहेबांनी सांगितलं त्यानुसार नागपूर रिजनल मॅनेजर श्रीवास्तव साहेब अकोला ब्रॅंचमधील बुडीत कर्जांमधे घोळ घालून ठेवलेल्या आधीच्या मॅनेजर इतकंच नंतर चार्ज घेतलेल्या मलाही जबाबदार ठरवू पहात होते आणि सर्व सुरळीत होईपर्यंत मला स्वेच्छानिवृत्तीसाठी आवश्यक असणारी ‘क्लीनचिट’ द्यायला टाळाटाळ करीत होते.३१ डिसेंबर ही सदर योजनेच्या अंमलबजावणीची अखेरची तारीख उजाडली तेव्हा माझा एकट्याचाच अर्ज अजूनही पेंडिंग असल्याचं लक्षात येताच एम्.डी.आॅफीसने तिथे सर्वांना धारेवर धरलं होतं.मी पुढे चालून आलेली एक सुवर्णसंधी हातून निसटूनच गेलीय हेच गृहित धरुन सगळं नाईलाजाने स्विकारलं होतं त्याचवेळी तिकडं सेंट्रल आॅफिस पातळीवर मात्र या प्रकरणाला अचानक हे वेगळंच वळण लागलं. तिथे हे प्रकरण थेट स्वत:च्या ताब्यात घेतलं ते नेमकं मला व्यक्तिशः ओळखणाऱ्या जी.एम्. मॅडमनीच. आणि दुसऱ्याच क्षणी वखरेसाहेबांच्या फोनचा रिंगटोन! अकोला ब्रॅंचमधील चिघळलेल्या प्रश्नाची सविस्तर पार्श्वभूमी मॅडमनी त्यांच्याकडून समजून घेतली आणि थेट श्रीवास्तव साहेबांना फोन करुन कडक शब्दांत याप्रकरणातील त्यांच्या कॅज्युअल अॅप्रोच आणि टाईम किलींग टॅक्टीजवर ताशेरे ओढत ‘ लिमयेनी तिथे अल्पकाळात प्रतिकूल परिस्थितीत जे कांही काम केलंय त्याचं पूर्ण रेकाॅर्ड झोनल व सेंट्रल आॅफिसमधे सुरक्षित आहे’ असं त्यांना स्पष्ट शब्दात बजावून ‘ घ्याल तो निर्णय पूर्ण जबाबदारीने घ्या आणि त्याच्या परिणामांना सज्ज रहा’ असं त्यांना बजावलं.

पुढच्या पंधरा-वीस मिनिटातच मला क्लीनचीट देणारा फॅक्स श्रीवास्तव साहेबांनी सेंट्रल आॅफीसला पाठवला होता आणि त्याची एक प्रत वखरेसाहेबांकडे.

वखरेसाहेब काय किंवा या जी.एम्.मॅडम काय, या सर्व घटनाक्रमात तिथं दुसरं कुणीही असतं तर? हे असंच या क्रमाने घडलं असतं? सगळं योगायोगानेच घडावं तसंच घडत गेलेलं असूनही त्या मागचा सूत्रधार मात्र ‘तो’च होता. त्या शिवाय हे सगळं असंच घडणं शक्य तरी होतं का? माझ्या आयुष्यातल्या अशा असंख्य बिकट वाटांवरच्या प्रत्येक अंधाऱ्या वळणावर मला लख्ख प्रकाशवाट दाखवणाराही ‘तो’च तर होता!

“सोs..टूमारो वील बी ए लास्ट डे आॅफ युवर सर्व्हिस लाईफ. विश यू आॅल द बेस्ट!” वखरेसाहेबांचे शब्द ऐकून मी दचकून भानावर आलो.स्वप्नवत वाटावेत असे त्यांचे ते शब्द मला भानावर आणतानाच आतून हळवं करून गेले.

“नका काळजी करु.सगळं व्यवस्थित होईल. मी आहे ना?” या त्यांच्याच शब्दांनी कांही दिवसांपूर्वीच मला आश्वस्त केलं होतं आणि आज त्यांचेच शब्द मला आनंदाने नव्या हव्याहव्याशा अशा अनोख्या वाटेवर निश्चिंतपणे मार्गस्थ व्हायचे संकेत देत होते!!

“थॅंक्यू व्हेरी मच सर..थॅंक्स फाॅर एव्हरीथिंग..”

माझा आवाज भरून आला होता. कसंबसं स्वतःला सावरत मी त्यांचे आभार मानले आणि जाण्यासाठी उठलो.

“बसा. हॅव अ कप आॅफ टी वुईथ मी..” ते मनापासून म्हणाले.

आज पंचवीस वर्षे उलटून गेल्यानंतरही त्या संध्याकाळपर्यंतचे हे असे सगळे क्षण आपसूकच माझ्या मनात अलगद जपले गेलेयत. कारण माझा अनोखा भविष्यकाळ खऱ्या अर्थाने कृतार्थ करण्यासाठी माझ्या संपूर्ण आयुष्यालाच अतिशय रेखीव अशी सकारात्मक कलाटणी देणारी ती संध्याकाळ माझ्या उर्वरित आयुष्यासाठी एक नवी पहाटच ठरली होती!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “यशामागे काही रहस्य वगैरे नसते…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? विविधा ?

☆ “यशामागे काही रहस्य वगैरे नसते…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

काल खूप दिवसांनी सागर‌ भेटला. मला आवडतो तो मुलगा. खूप positive एकदम शांत. मी त्याला गुरुजीच म्हणते कारण तो माझे मोबाईल चे सर्व doubts शांतपणे clear करतो. नेहमी प्रोत्साहन देतो.

काकू येईल तुम्हाला, असं म्हंटल की माझा पण उत्साह वाढतो.

एका कंपनीचा मालक आहे तो. त्याचे चांगले दिवस खूप कष्टानंतर आले आहेत. स्पष्ट ध्येय, कष्ट, धैर्य, clear thought process व घरच्यांचा सहयोग, हीच यशाची गुरुकिल्ली आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

चांगली लठ्ठ पगाराची नोकरी सोडून स्वतः चा व्यवसाय सुरू करणे, ही धमक आजकाल नवीन मुलांमधे दिसते. त्या प्रवासात येणारे चढ- उतार calculated risk लक्षात घेतलेली असतेच. तरीही सर्व आपण विचार केल्याप्रमाणेच होते असे नसते ना. दुसरे, म्हणजे स्थिरस्थावर व्हायला किती वेळ लागेल?? हे निश्चित नाही. आयुष्याची तरुणाईची महत्वाची वर्षें तीच, कामाची तीच, परिवाराची मजा करायची वेळ पण तीच. म्हणजे संकल्प, त्याग, घरच्यांचे सहकार्य तर हवेच. बरोबर आयुष्याच्या गणिताकडे पण लक्ष द्यायचे आहे. सर्व गोष्टींचा balance सांभाळुन काम करायचे. कुठे थांबायचे ?? कुठे रेघ ओढायची ???हे समजले पाहिजे. व तसे वागताही आले पाहिजे. कुठे लक्ष द्यायचे ??व कुठे दुर्लक्ष करायचे ??हे ही ठरविता आले पाहिजे. पडलो तर उठून उभा राहिन ही धमक व आत्मविश्वास पाहिजे. ‌व अशा वेळेस घरच्यांचा विश्वास व आधार हवाच. .

काही लोकांना सर्व गोष्टींचा व्यवस्थित विचार करून त्यांची क्रमवार मांडणी करता येते. तीच यशाची पहिली पायरी असते असं नाही की ते खूप हुशार असतात. पण त्यांना हे नक्की माहित असतं. केंव्हा काय करायचे.

विचार स्पष्ट असले व स्वतः वर विश्वास असला तरच ते करता येते. दुसरं म्हणजे यश आणि अपयशाकडे बघायचा त्यांचा योग्य दृष्टिकोन असतो. यशाची कारणे व अपयशाचे बरोबर विश्लेषण करता येते त्यांना. अशी माणसे blame game खेळत नाही. सर्व जबाबदारी स्वतः वर घ्यायची हिम्मत ठेवतात. लहान सहान गोष्टींवर लक्ष देत नाही. व घाबरत तर त्याहून नाही. कोणाचे ऐकायचे व कोणाचे नाही हे त्यांना छान जमते.

यशस्वी माणसे खूप चतुर असतात.  ते focussed असतात. शिस्तप्रिय असतात. कोणत्याही कामात मदत लागतेच, तेंव्हा योग्य लोकांची निवड करणे हे महत्त्वाचे, कारण आयुष्याला चांगले वळण मिळायला चांगल्या वेळेची नाही तर चांगल्या माणसांची गरज असते.  

टीम management, योग्य कार्य पध्दती, कर्मचाऱ्यांचे आपापसातील संबंध, थोडक्यात आपल्या टीम ला एक मोठा परिवार समजून ज्याला काम करणे जमते, तो अर्धी लढाई तर तेथेच जिंकतो.

रोज रात्री दुसऱ्या दिवशी चे planning व दिवस संपला की त्याचे विश्लेषण ही सवय असली, तर वेळ वाया जात नाही. व योग्य दिशेने प्रवास होतो. विचारांना योग्य दिशा देता येते. सर्वात सुक्ष्म पण ताकदवर काही असेल‌ तर ते आपले विचार असतात. परिवर्तन आणण्याची अफाट शक्ती असते त्यांच्यात. संधी चालून येत नसते. ती शोधायची असते व मिळताच त्याचे सोने करता आले पाहिजे.

सर्व सामान्य माणसांची परिस्थिती साधारण सारखीच असते. झेप घेण्याची तयारी, मेहनत करण्याची प्रबळ इच्छा असली तर कदाचित वेळ लागेल पण यश नक्कीच. मिळते.  

गीतेतही सांगितले आहेच जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावेच लागेल.

आजचा दिवस चांगला जाणार या विचाराने जर दिवसाची सुरवात केली तर कठिण प्रसंगाचा सामना करायचे बळ आपल्या विचारांतच मिळते.

आज सागर बरोबर गप्पा मारताना चर्चेत बऱ्याच गोष्टी कळल्या. ‘ Positivity ‘ खऱ्याखुऱ्या अर्थाने समजली नवीन पिढी बद्दलचा माझा आदर अजूनच वाढला.

नवीन पिढी हुषार आहे. त्यांचे विचार, risk घेण्याची तयारी, आपल्या कामाचे ज्ञान व अभ्यास खरच कौतुकास्पद आहे.

बदलत्या जगाबरोबर धावणे जमते त्यांना. आपला मार्ग ते स्वतः आखतात. अनुभवाने श्रीमंत होतात. अशी मुले रोज नव्याने आयुष्य जगतात.

सागर सारखी मुले सध्या चालू असलेल्या ‘आत्मनिर्भर भारत ‘ या मोहिमेत आपले योगदान देत आहेत.

“जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणी ही थांबवू शकत नाही.”

म्हणतात ना

“यशामागे काही रहस्य वगैरे नसते. प्रचंड कष्ट व योग्य नियोजन आणि अपयशातून जिंकायची वृत्ती त्यातुन हे साध्य करता येते.”

© सुश्री संध्या बेडेकर 

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “साडेतीन शहाणे…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “साडेतीन शहाणे…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

साडेतीन म्हटल्यावर नकळतच तोंडातून शहाणे असाच पुढचा शब्द बाहेर पडतो. किंवा साडेतीन शहाणे अस म्हंटल्यावर पेशवाई व सोबत सखारामपंत बोकील, देवाजीपंत चोरघडे, विठ्ठल सुंदर आणि नाना फडणवीस हीच नांव डोळ्यासमोर येतात.

पेशवाईच्या अगोदर किंवा नंतर अशा प्रकारची माणसं नव्हती किंवा नाहीत अस नाही. पण पेशवाई आणि हिच नांव साडेतीन शहाणे असा ऊल्लेख झाल्यावर येतात.

राजेशाही, पेशवाई संपली. राज्य, संस्थानं जाऊन देश, व प्रादेशिक प्रदेश म्हणजे राज्य उदयास आली. याच बरोबर वेगवेगळे पक्ष आणि त्या पक्षातल्या खंबीर नेतृत्वाची माणसं समोर आली. काहिंंनी खंबीरपणे पक्षाच नेतृत्व केलं. तर आपण खंबीर असल्याच्या बळावर काहींनी वेगळा पक्ष, गट तयार केला. तसंच काही घराणी आणि घराण्यातली काही माणसं कर्तुत्ववान असल्याच दाखवत त्यांना पुढे आणण्याचा अटोकाट प्रयत्न सुरु झाला, व तो अजूनही काही प्रमाणात बर्‍याच ठिकाणी सुरु आहे. आणि हीच राज्य, पक्ष, आणि कुटुंबातील काही माणसं पाहिली की परत आठवण होते ती साडेतीन शहाणे या शब्दाची.

पेशवाई काळातले साडेतीन शहाणे यांचा ऊल्लेख नक्की कोणत्या अर्थाने (म्हणजे चांगले का कारस्थानी) करतात हे ठामपणे सांगता आलं नाही तरी ते नक्की कोण आणि त्यातले पूर्ण आणि अर्धे शहाणे कोण हे पक्क होतं. या माणसांची आज एक उद्या अर्धा अशी अदलाबदल नव्हती. पण आज जाणवणाऱ्या साडेतीन शहाण्यांच तसं वाटत नाही.

कारण आज जो पूर्ण शहाणा वाटतो तो कदाचित उद्या अर्धा शाहणाच वाटेल, किंवा शहाणा या यादितही नसेल. तसेच सध्या एकाच पक्षात, राज्यात, घराण्यात या प्रकारचे लोक असल्याच बोललं जातं. सत्तेसाठी किंवा विरोधासाठी एकत्र येण्याचा कल दिसतो. यासाठी धर्म, जात, भाषा, ऊत्सव या (साडेतीन) गोष्टिंचा आधार घेतलेला दिसतो. काहीवेळा खरंच याच गोष्टिंना आधार देण्याची, व यांचा आधार घेण्याची गरज आहे याची जाणीव होते. तर काही वेळा आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी याचा वापर केला असं वाटतं. मग यासाठी एकत्र आलेल्या लोकांमधे या प्रकारचे साडेतीन शहाणे सत्तेेसाठी, विरोधासाठी एकत्र असल्याचा सुर निघतो. या एकत्र आलेल्या साडेतीन शहाण्यांचे परत आपले आपले साडेतीन शहाणे असल्याची चर्चा होते. आणि या साडेतीन शहाण्यांची साखळी किंवा संख्या वाढत जाते असं वाटलं तरी जनमानसात सगळ्यांचा ऊल्लेख साडेतीन शहाणे असाच होतो. आणि बर्‍यचदा त्यात उपहास, टिंगलच जाणवते.

यातला एखादा मुळातच अर्धा असतो. पण आपणच पूर्ण असल्याच्या विश्वास त्याला वाटतो. लोक आपल्यामागे फिरतील असा भ्रम त्याच्या मनात निर्माण झाल्याने मग तो तळ्यात मळ्यात करतो. आणि तो येऊन मिळाल्याने अगोदर संख्येने तीन असणारे व्यावहारिक द्रृष्ट्या साडेतीन झाल्याची चर्चा सुरू होते. विचारांप्रमाणे या चर्चेत गांभीर्य, उपहास, विनोद सगळच जाणवतं.

मुहूर्तांंमधे साडेतीन मुहूर्त, देेवस्थानात साडेतीन शक्तीपीठं हे शब्द कायम वापरले जातील. तसंच शहाणे हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला गेला तरी साडेतीन शहाणे असा वापर यापुढे सुध्दा होत राहील असं वाटत.

 ©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘संपूर्ण शरणागतीचे तत्वज्ञान’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘संपूर्ण शरणागतीचे तत्वज्ञान’ ☆ श्री दिवाकर बुरसे

प्रपत्ती : संपूर्ण शरणागतीचे तत्त्वज्ञान

भक्ती, तत्त्वज्ञान आणि कृपायोगाचा दिव्य संगम

 प्रस्तावना : अहंकारापासून अनंताकडे

मानवी जीवनाच्या आध्यात्मिक प्रवासात एक असा टप्पा येतो की जिथे साधकाला स्वतःच्या प्रयत्नांची मर्यादा जाणवते. त्याच्या अध्यात्मप्रवासात एक क्षण असा येतो की प्रयत्नांची शिडी संपते आणि कृपेचे आकाश सुरू होते.

ज्ञान, कर्म, साधना, तपस्या — या सर्व मार्गांनी प्रयत्न करताना अखेरीस मनाला उमगते की अंतिम सत्य प्राप्त करण्यासाठी अहंकाराचा सर्वस्वी त्याग आणि परमेश्वरावर संपूर्ण विश्वास अत्यावश्यक आहे. याच अवस्थेला भारतीय ‘ विशिष्ठाद्वैत तत्वज्ञान’ परंपरेत “प्रपत्ती” असे म्हणतात.

संस्कृतमधील “प्र + पत्” या धातूपासून सिद्ध झालेला हा शब्द पूर्णपणे शरण जाणे, स्वतःला अर्पण करणे असा अर्थ व्यक्त करतो.

भगवद्गीतेतील भगवान श्रीकृष्णाचे प्रसिद्ध वचन या तत्त्वज्ञानाचे सार सांगते —

“सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।

अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ॥”

(भगवद्गीता १८. ६६)

या एका श्लोकात प्रपत्तीचा संपूर्ण आध्यात्मिक अर्थ सामावलेला आहे.

 

१. प्रपत्ती : तात्त्विक संकल्पना

प्रपत्ती म्हणजे स्वकर्तृत्वाचा अभिमान सोडून परमेश्वराच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवणे.

भक्तीमार्गात ही अवस्था तेव्हा येते जेव्हा साधकाला स्वतःच्या मर्यादा स्पष्ट जाणवतात. त्या क्षणी तो म्हणतो —

“मी नाही; सर्व काही तूच. ”

या भावनेचे वर्णन करताना जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात, “आपुलिया बळे नाही मी बोलत । सखा कृपावंत वाचा त्याची ॥” माणूस स्वतः काही करीत नाही; करणारा खरा परमेश्वरच आहे.

 

२. रामानुजाचार्य आणि प्रपत्तीचा मार्ग

आचार्य रामानुज (१०१७–११३७) यांनी प्रतिपादित केलेल्या विशिष्टाद्वैत वेदान्तात प्रपत्तीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.

त्यांच्या मते जीव आणि परमेश्वर यांचे नाते शेष–शेषी असे आहे —

जीव हा परमेश्वरावर अवलंबून असलेला अंश आहे.

रामानुजाचार्यांच्या “शरणागति गद्य” या ग्रंथात ते परमेश्वराला विनवतात —

“नारायण! तव पादारविन्दयोः शरणं प्रपद्ये।”

ही केवळ प्रार्थना नसून पूर्ण आत्मसमर्पणाची अनुभूती आहे.

 

३. प्रपत्तीची सहा अंगें

या परंपरेत शरणागतीची सहा लक्षणे सांगितली आहेत —

“अनुकूल्यस्य संकल्पः प्रतिकूलस्य वर्जनम् ।

रक्षिष्यतीति विश्वासो गोप्तृत्ववरणं तथा ।

आत्मनिक्षेपकार्पण्ये षड्विधा शरणागति: ॥”

या सहा अंगांमध्ये प्रपत्तीचे संपूर्ण स्वरूप दिसते.

अनुकूलस्य संकल्पः — ईश्वराला अनुकूल तेच आचरण करणे

प्रतिकूलस्य वर्जनम् — प्रतिकूल गोष्टींचा त्याग

रक्षिष्यतीति विश्वासः — परमेश्वर रक्षण करील हा दृढ विश्वास

गोप्तृत्ववरणम् — त्यालाच पालनकर्ता मानणे

आत्मनिक्षेपः — पूर्ण आत्मसमर्पण

कार्पण्यम् — स्वतःची दीनता स्वीकारणे

 

४. भक्तिमार्गी संतपरंपरेतील प्रपत्ती

संतपरंपरेत प्रपत्तीचा भाव अत्यंत सजीवपणे व्यक्त झाला आहे. दासबोधात समर्थ रामदासस्वामी म्हणतात,

“आपण मिथ्या साचा देव । देव भक्त अनन्यभाव ।… या नाव आत्मनिवेदन ॥”

(४. ९. २२)

रामरायाकडे समर्थ मागणे काय मागतात पहा, “मजविण तू मज दे रे राम!

 मीराबाईंचं ईश्वराशी हे एकरूप होणं पहा…

“लाली मेरे लालकी जिथ देखूं तिथं लाल

लाली देखन मै गयी, मै ही होगई लाल! “

तुकाराम महाराज म्हणतात,

“घालुनिया भार राहिलो निश्चिंती ।

……….

खुंटले सायास आणिक या जीवां ।

धरिले केशवा पाय तुझे ॥

तुज वाटे आता करी रे अनंता ।

तुका म्हणे संता लाज माझी ॥”

 

संत एकनाथ महाराज म्हणतात,

” अवघेचि त्रैलोक्य आनंदाचे आता ।

चरणी जगन्नाथा चित्त ठेले ॥

माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ ।

अनाथांचा नाथ जनार्दन ॥

एका जनार्दनी एकपणे उभा ।

चैतन्याची शोभा शोभतसे ॥ “

 

५. प्रपत्ती आणि कृपायोग

प्रपत्तीचा मार्ग हा केवळ साधकाच्या प्रयत्नांवर आधारित नाही; तो ईश्वरकृपेवर आधारित आहे. भक्त सतत प्रेमपूर्वक भजन करतो, तेव्हा परमेश्वर स्वतः त्याला मार्ग दाखवतो.

श्रीवैष्णव तत्त्वज्ञानात मोक्ष हा केवळ साधकाच्या साधनेचा परिणाम नसून परमेश्वराच्या निरपेक्ष कृपेचा प्रसाद मानला जातो. प्रपत्ती म्हणजे त्या कृपेचे द्वार उघडणारी अंतःकरणाची अवस्था होय.

 

६. प्रपत्तीचे आध्यात्मिक सौंदर्य

प्रपत्ती म्हणजे पलायन नव्हे; ती आहे अहंकारावर मात करून अनंताशी एकरूप होण्याची प्रक्रिया.

जेव्हा भक्त म्हणतो —

“मी तुझा आहे; तूच माझे सर्वस्व आहेस. ”

तेव्हा त्या क्षणी भक्त आणि भगवान यांच्यातील भेद विरघळतो, द्वैत विरते!

 

७. आत्मनिवेदन आणि प्रपत्ती

नवविधा भक्तीतील ‘आत्मनिवेदन’ आणि रामानुजाचार्यांची ‘प्रपत्ती’ हे दोन्ही पूर्ण शरणागतीचे सिद्धांत आहेत, पण त्यांची तात्त्विक चौकट, रचना आणि पायऱ्यांमध्ये स्पष्ट भेद आहे.

 

आत्मनिवेदनची व्याख्या:

नवविधा भक्ती ही भगवद्गीतेच्या भक्तियोगावर आधारित नऊ पायऱ्यांची प्रक्रिया आहे, ज्यात नववी पायरी ‘आत्मनिवेदन’ आहे. यात भक्त स्वतःचा देह, मन, धन, कर्तृत्व आणि फळ—सर्वस्व भगवंताला समर्पित करतो, “मी तुझाच” ही श्रद्धा दृढ पणे अंतःकरणात बाळगतो. यात ईश्वरावर संपूर्ण विश्वास आणि स्वातंत्र्य-अहंकाराचा पूर्ण त्याग करून वाट्याला आलेल्या सुख-दुःखाला त्याचीच इच्छा मानणे हे मुख्य आहे.

 

प्रपत्तीची व्याख्या:

रामानुजाचार्यांच्या विशिष्टाद्वैत वेदांतात प्रपत्ती ही शरणागतीची प्रक्रिया आहे, जी कर्म-ज्ञान-भक्तींपेक्षा थेट परमेश्वरकृपेवर अवलंबून आहे. यात वर उल्लेखिलेली सहा अंगे आहेत: अनुकूल कर्मांचा संकल्प, प्रतिकूलांचा त्याग, रक्षकत्वाचा विश्वास, गोप्तृत्वस्वीकार, कार्पण्य (असहाय्यता) आणि आत्मनिक्षेप (आत्मार्पण). ही संरचित, शास्त्रोक्त पद्धत मोक्षासाठी एकमेव साधन मानली जाते

 

साम्याचे मुद्दे:

दोन्ही सिद्धांतांचा केंद्रबिंदू “पूर्ण समर्पण” हा आहे—अहंकारत्याग, ईश्वरकेंद्रित जीवन, कृपेवरील अवलंबन आणि स्वतःचे सर्वस्व त्याच्या चरणी अर्पण. भावार्थाने ही एकाच अध्यात्मिक सत्याची दोन रूपे दिसतात.

 

भेदाचे मुद्दे:

भावतत्त्वाने दोन्ही जवळजवळ समान आहेत, पण शास्त्रीय रचना, परंपरा आणि तात्त्विक चौकटीमुळे हे वेगळे सिद्धांत मानले जातात. त्यांना एकच म्हणता येत नाही.

 

८. उपसंहार : समर्पणातच अनंत

मानवी जीवनात ज्ञान, साधना, तपस्या आणि कर्म यांना महत्त्व आहे. परंतु या सर्व प्रयत्नांचा अंतिम अर्थ तेव्हाच उमगतो जेव्हा साधकाला समर्पणाची अनुभूती प्राप्त होते.

 

प्रपत्ती म्हणजे प्रयत्नांचा पराभव नव्हे;

ती आहे अहंकारावरचा विजय होय.

भक्ताच्या अंतःकरणात जेव्हा ही जाणीव उमलते —

“देवा, मी तुझा आहे. ”

तेव्हा परमेश्वरही जणू त्याला अश्वासक उत्तर देतो —

“हो, तू माझाच आहेस.”

अशा या दिव्य संवादातच भक्तीचा परमोच्च क्षण जन्म घेतो.

आणि त्या क्षणी साधकाला उमगते —

समर्पणातच स्वातंत्र्य आहे,

आणि शरणागतीतच मोक्ष आहे!

 

त्वमेव माता च पिता त्वमेव

त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव ।

त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव

त्वमेव सर्वं मम देवदेव ॥

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares