पैसे देऊन वस्तू व काही प्रमाणात सेवा विकत मिळण्याचं ठिकाण असंच बाजार या बद्दल सांगता येईल. पण तरीही वेगवेगळा अर्थ बाजार या शब्दात असतो. ज्या वस्तू पैसे देऊन उघडपणे मिळतात व जिथे व्यवहार सरळ, व सचोटिने होतात असे कितीतरी बाजार आहेत.
भाजी बाजार, सराफ बाजार, मासळी बाजार, धान्य बाजार, कापड बाजार, अजूनही काही प्रमाणात बर्याच ठिकाणी भरला जाणारा आठवडे बाजार असे नेहमीचे व सगळ्यांना माहित असणारे अनेेक बाजार आहेत. या बाजारात मिळणार्या वस्तूंचे भाव सगळ्यांसाठी, सगळ्यावेळी सारखेच असतात अस नाही.
पण शाळेत वर्गावर शिक्षक येण्याआधी आमचा वाढलेला गोंधळ, गोंगाट ऐकून शिक्षक आल्यावर म्हणायचे, काय बाजार भरवला आहे. याचा अर्थ बाजार म्हणजे गोंधळ, गोंगाट, आणि बेशिस्तपणा असाच असायचा.
गुरांचा बाजार पण असतो. नावावरुन या बाजाराच स्वरूप काय असेल ते लक्षात येतच. पण निवडणूक झाल्यानंतर मात्र काहीवेळा वारंवार घोडेबाजार हा शब्द वापरला जातो. तेव्हा मात्र शब्द जरी घोडेबाजार असा असला तरी तो वापरतांना त्यात घोड्याचा नाहीतर कोणाचा उल्लेख असतो हे सहज लक्षात येतं. पण तो शब्द उघडपणे वापरला जातो. आणि नकळत आपण प्राण्यांच्या रांगेत एका बुध्दीजीवी समजल्या जाणाऱ्या प्राण्याला बसवतो. एकिकडे बुध्दीमुळेच आपल्यात व प्राण्यात भेद आहेत हे सांगतो. आणि दुसरीकडे या घोडेबाजाराचा उल्लेख करत परत बुध्दीवरच शंका घेतो. एखाद्याला समजत नसेल तर त्याला गाढव म्हंणण समजून घेउ. पण…
या शिवाय ‘बाजार’ नावाचा एक चित्रपट पण काढला होता. यात काय दाखवलं होत ते सांगणार नाही, पण बाजार हा शब्द फक्त चांगल्या, किंवा फक्त वाईट गोष्टींसाठीच वापरला जातो अस नाही. तर त्यावेळी भावना कोणत्या असतात त्यावरून चांगल का वाईट हे ठरवाव लागतं. आता चोरबाजारही असतो. पण तिथे वस्तू विकत घेणारे चोरच असतात अस नाही. शेअर बाजार पण आहे. याबद्दल सांगायची गरज आहे असही नाही.
शारिरीक दुखणं, अपघात, डाॅक्टर, हाॅॅस्पिटल, ऑपरेशन या गोष्टींची देखील आता काहीप्रमाणात सवय झाली आहे. पण आता अशा ठिकाणी देखील पाॅलीसी आहे का? … अशी विचारणा पहिल्यांदा होतेच. हा विचारण्याचा हेतू वाईटच असतो अस नाही. पण काहिवेळा याचा अनुभव चांगला सुध्दा नसतो. अशा पाॅलीसी देणारे अनेक आहेत. पण यापैकी एकाचा पाॅलीसी बाजार असाच उल्लेख करतात. आणि मग खरच बाजार या शब्दाबद्दल सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही विचार मनात येतातच.
या सगळ्या बाजाराचा विचार मनात आला तो सध्या सुरु असलेली सिलेंडरच्या काळ्याबाजाराच्या चर्चेवरून. वरचे सगळे बाजार हे दिसतात, खूपदा त्यांची ठिकाणही ठरलेली असतात. पण काळाबाजार हा असा बाजार आहे जो असतो, भरतो पण दिसत नाही. किंवा दिसणार नाही याचीच दक्षता या बाजारात घेतली जाते. हा प्रत्येकवेळी एकाच गोष्टीचा, एकाच ठिकाणी, एकाच वेळी नसतो. परिस्थिती आणि काळ यानुसार याची सगळी गणितं बदलतात. स्वस्त दरात पुरवठा होणारं धान्य. खतं, ज्या गोष्टी अनधिकृतपणे विकल्या जातात अशा गोष्टी. अशा सगळ्या गोष्टींचा मग काळाबाजार भरतो.
या शिवाय सिनेसृष्टीला माया बाजार अस म्हणणारे आहेत. याची पण अनेक कारणं असतील. शिवाय भंगार बाजार, कोंबडी बाजार असेही बाजार असतात. पण सगळ्या बद्दल लिहिल तर शब्दांचा बाजार भरवला अस वाटेल.
बाजार या शब्दामुळे विचारांचा बाजार भरला होता. तो थोडा थोडा कमी करतोय, बाकी काही नाही.
☆ “पु ल देशपांडे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
मृतवत झालेल्या संस्कृत भाषेतील एका वाक्याचाही धड अर्थ न सांगता येणारे म्हणतात की संस्कृत भाषा ही राष्ट्रभाषा व्हावी. त्या दांभिकोत्तमांना पु ल देशपांडे यांनी इचलकरंजी येथील अखिल भारतीय सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलनात केलेल्या भाषणातून जे सणसणीत आणि खणखणीत उत्तर दिले आहे ते असे…
‘भाषेच्या बाबतीतसुद्धा काही संकेत ठरून गेले. तुकोबांची मराठी चेपली गेली आणि पंतकाव्याचा मराठी गद्य आणि पद्य अवतार मान्य झाला. सभ्यतेचं नातं आशयाशी न जुळता संस्कृतप्रचुर भाषेशी जुळलं! आजही आपल्या भारदस्तपणाची सांगड मराठीत आलेल्या संस्कृत शब्दांशीच घातली गेली आहे. खेड्यापाड्यातला नव्याने शिकलेला वर्ग तर उगीचच चांगले चांगले मराठी शब्द टाकून वर्तमानपत्रवाल्यांनी पुरवलेले संस्कृत शब्द वापरतो. आमचे पुढारी चुकलो, नेते सभेला ‘येत’ नाहीत, ‘उपस्थित’ राहतात. एके काळी इंग्रजी भाषेच्या दराऱ्यामुळे बायकोची मिसेस् झाली. तत्कालीन पांढरपेशा समाजात इंग्रजीला जे सामाजिक मोठेपण लाभलं ते आता पुन्हा नवशिक्षित बहुजन समाजातल्या प्रतिष्ठितांत संस्कृतप्रचुर मराठीला लाभायला लागलं आहे. संस्कृतवर माझा राग नाही. रेडिओवरून मी संस्कृतमधल्या बातम्या ऐकतो. इतका विनोदी कार्यक्रम मला लिहिता आला नसता. ‘डॉक्टर किसिंजरेण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅग्रिकल्चरल रिसर्चे अभिभाषणम् कृतम्’ वगैरे ऐकताना इंग्रजी आणि संस्कृतचा हा व्रात्यस्तोम पद्धतीने लागलेला विवाह पाहून मीदेखील ‘अहो ब्यूटिफुलम् एतद्! ‘ असं म्हणतो. पण हे संस्कृतचं प्रकरण इतकं साधं नाही. तिच्यामागे कोठेतरी ही देववाणी आहे या कल्पनेशी जुळलेलं नातं आहे. उर्दूच्या आग्रहात मुसलमानांचा जसा धर्माभिमान दडला आहे, तसाच संस्कृतच्या मागे आमचा संस्कृतिविषयक कल्पनांचा अभिमान दडला आहे. ‘
‘कोठेतरी आपण ह्या भाषेचं अतिमानवी शक्तीशी नातं जुळवलं आहे. त्यातून आमचे राष्ट्रवादी पुढारी संस्कृतचे अभिमानी. आश्चर्य असं की, स्वतः लोकमान्य टिळक हे संस्कृतचे पंडित असून साध्या मराठीचे पुरस्कर्ते होते. मंडालेहून सुटून आल्यावर त्यांच्यावर संपादक मंडळापैकी कोणीतरी अग्रलेख लिहिला, त्याचा मथळा होता ‘लोकमान्यांची बंधमुक्तता’! लोकमान्यांनी त्याच्यावर काट मारली आणि लिहिलं, ‘टिळक सुटले’! पण असा एखादा अपवाद सोडला तर मराठी साहित्यातल्या संस्कृतच्या ह्या जन्मसिद्ध बडेजावामुळे पुन्हा एकदा जनसामान्यांची भाषा निराळी आणि मराठी साहित्याची भाषा निराळी व्हायला लागली. पुढे इंग्लिश हे मोठेपणाचं लक्षण झालं. आजही आमच्या नवसुशिक्षित श्रीमंत मराठी समाजात आपल्या पोराच्या सुंदर मराठीचं कौतुक करण्याऐवजी तो ‘ज्याक् अॅण्ड जिल्’ किती छान म्हणतो याचंच कौतुक अधिक होतं. फुल्यांची मराठी भाषा तथाकथित सुसंस्कृत समाजाच्या मताने वाचण्याच्याही योग्यतेची नव्हती! शेतकऱ्याच्या दारिद्रयाचं फुल्यांनी आपल्या ‘शेतकऱ्याचा असूड’ ह्या पुस्तकात काढलेलं शब्दचित्र केवळ भाषेच्या शैलीच्या दृष्टीनं पाहिलं तरी किती प्रभावी आहे! पण आमच्यापुढे आदर्श शैली होती चिपळूणकरांची. ‘
☆ ‘श्यामलतेची दिव्यता’ – भारतीय काव्यातील वर्णसौंदर्य☆ श्री दिवाकर बुरसे ☆
प्रस्तावना
भारतीय काव्यपरंपरेत काही रूपं अशी आहेत, की त्यांचं वर्णन करताना शब्दही शहारतात. कारण तिथे केवळ देह नसतो, तर देहापलीकडची कांती असते; केवळ रंग नसतो, तर अनुभूतींचं अथांग विश्व दडलेलं असतं.
“श्याम”, “श्यामल”, “मेघश्याम”, “नीलमेघवर्ण”, “हिरण्यवर्ण”, “स्वर्णमय”, “कर्पूरगौर” — हे शब्द त्वचेच्या रंगाचं वर्णन करणारे नाहीत; ते करुणा, माधुर्य, गूढता, शांती आणि दिव्य तेजाचे स्वर आहेत. म्हणूनच भारतीय कवींनी श्रीराम, श्रीकृष्ण, श्रीलक्ष्मी किंवा श्रीमहादेव यांचं वर्णन करताना रंग नव्हे, तर आपल्या दर्शनानुभूती रंगवल्या.
राम : शांत निळाईचा करुणासागर
“नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गम्” ही ओळ उच्चारताच मनात एक गंभीर, दयार्द्र आणि प्रसन्न निळाई उतरते.
रामांचं श्यामल रूप म्हणजे स्थैर्याची कांती. त्यांच्या वर्णात आकर्षण आहे; पण त्याहून अधिक संयम आहे. मुखावर तेज आहे; पण नेत्रांत त्याहून अधिक करुणा आहे. जणू ऋषींच्या तपश्चर्येतून सांजवेळचं नील आकाश आकार घेत गेलं आणि त्यातून रामांचं रूप प्रकट झालं.
“रामं दूर्वादलश्यामम्… ” — दूर्वेच्या कोवळ्या हिरवट-निळसर छटेसारखी त्यांची कांती : शीतल, सौम्य आणि डोळ्यांना निववणारी.
“नीलमेघश्याम” ही उपमा सहज जन्मलेली नाही. मेघ गडद असतो, पण भयावह नसतो; तो जीवनदाता असतो. त्याच्या कुशीत वीज असते, पण वर्षावात शीतलता असते. रामांची श्यामलता अशीच — सामर्थ्य आणि सौम्यता यांचा अद्वैत संगम.
त्यांच्या वर्णात श्रावणसंध्येची गंभीर प्रसन्नता आहे. जसा दिवस मावळताना आकाश अधिक गहिरं, अधिक शांत आणि अधिक सुंदर होत जातं, तशी रामांची कांती मनात उतरते.
कृष्ण : पावरीत विरघळलेली श्यामलता
“मेघश्यामं पीतकौशेयवासम्… ” ही ओळ ऐकताच श्रीकृष्ण जणू यमुनेच्या तीरावर उभे राहतात.
कृष्णांची श्यामलता ही गूढतेची माधुरी आहे. त्यांच्या वर्णात चपलता आहे, संगीत आहे आणि अंतःकरणाला मोहून टाकणारं आकर्षण आहे. मोरपिसांनी अलंकृत ते सावळं रूप म्हणजे जणू श्रावणमेघांनी बासरीचा स्वर धारण केला आहे.
तो अंधार नाही; तो चंद्रप्रकाशाला अधिक सुंदर करणारा निळसर गहिरा पडदा आहे. त्यांच्या श्यामल कांतीवर मोरपीस अधिक खुलतं, पीतांबर अधिक उजळतो आणि बासरीचा स्वर अधिक विरघळतो.
जशी काळ्या नभामुळं तारकांची शोभा वाढते, तशी कृष्णांच्या श्यामलतेमुळं भक्ती अधिक उजळते. म्हणूनच संत तुकाराम सहज उद्गारतात :
“सावळे सुंदर रूप मनोहर… ”
या एका ओळीत भारतीय सौंदर्यदृष्टीचा आत्माच दडलेला आहे.
श्यामरंग : गूढ प्रकाशाची सावली
राम आणि कृष्ण यांचा श्यामल वर्ण सामान्य अनुवंशिक देहवर्णाच्या चौकटीत मावणारा नव्हता. “श्यामल” म्हणजे केवळ सावळेपणा नव्हे; ती सावळेपणातून झिरपणारी दिव्य कांती आहे.
भारतीय कवींनी रंगांना त्वचेच्या मर्यादेत बंदिस्त केलं नाही. त्यांनी रंगांत स्वभाव पाहिला, करुणा पाहिली, माधुर्य पाहिलं, तेज पाहिलं. म्हणून इथं श्यामवर्णही राजस आहे आणि सावळेपणातही दिव्यता आहे.
श्याम रंग म्हणजे अंधार नव्हे; तो प्रकाशाचा अधिक गूढ झालेला स्वर आहे. जसा रात्रीच्या नभात चंद्र अधिक सुंदर दिसतो, तशीच श्यामलतेच्या पार्श्वभूमीवर करुणा अधिक उजळते.
स्वर्णमयतेचे सूर्यस्पर्शी तेज
भारतीय वाङ्मयानं केवळ श्यामलतेलाच दिव्यता दिली नाही; त्यानं स्वर्णमय तेजालाही तितक्याच आदरानं गौरवलं.
वैदिक श्रीसूक्तात श्रीलक्ष्मीचं वर्णन “हिरण्यवर्णां”, “पद्मवर्णां”, “चन्द्रां प्रभासाम्” असं येतं. महाभारतात कर्णाचं, तर बौद्ध साहित्यात भगवान गौतम बुद्ध यांच्या वर्णाचं वर्णन “स्वर्णमय” असं आढळतं.
हे केवळ गोरेपण नव्हतं; ते वितळलेल्या सुवर्णासारखं तेजस्वी अस्तित्व होतं. त्वचेवर कमलदलासारखी कोमल गुलाबी छटा आणि व्यक्तिमत्त्वात सूर्यकिरणांची प्रभा होती. जणू पहाटेच्या बालरवीकिरणांनी मानवी रूप धारण केलं होतं.
भारतीय कवींनी व्यक्तिमत्त्वातील तेजाला रंगांची उपमा दिली — कुणी मेघश्याम झालं, कुणी हिरण्यवर्ण.
कर्पूरगौर शिव
श्रीराम आणि श्रीकृष्ण दोघेही श्यामवर्णी असले, तरी त्यांच्या वर्णात सूक्ष्म भेद आहे. रामांचा वर्ण निरभ्र आकाशासारखा शांत निळसर आहे; तर कृष्णांचा वर्ण वर्षाऋतूतील सजल मेघासारखा गडद नील.
महादेवांचा वर्ण मात्र याहून भिन्न आहे. कैलासनिवासी शिव “कर्पूरगौर” आहेत — हिमालयाच्या शुभ्रतेसारखे, “रजतगिरीसम” धवल आणि तेजस्वी.
त्यांच्या गौरवर्णात वैराग्याची शांतता आहे; जणू हिमशिखरांनीच मानवी रूप धारण केलं आहे.
काही रंग अनुभवावे लागतात
आज विज्ञान रंग मोजू शकतं, छटा ठरवू शकतं; पण “मेघश्याम” मोजू शकत नाही. कारण तो रंग त्वचेवर नव्हता — तो अनुभूतीत होता.
रामांचा श्याम वर्ण म्हणजे शांत प्रार्थना. कृष्णांची निळाई म्हणजे यमुनेवर तरंगणारी पावरी. श्रीलक्ष्मीची स्वर्णमय प्रभा म्हणजे समृद्धीचं मंगल तेज.
हे रंग चित्रांत रेखाटता येतात, शब्दांत मांडता येतात; पण पूर्णपणे उलगडता येत नाहीत. कारण काही रंग डोळ्यांनी दिसत नाहीत — ते अंतःकरणानं अनुभवावे लागतात.
आकाशाचा रंग हातात पकडता येत नाही; तो फक्त डोळ्यांत उतरतो. तशीच रामांची गंभीर श्यामलता, कृष्णांची मधुर निळाई आणि शिवांची कर्पूरगौर प्रभा भारतीय मनाच्या आकाशात आजही तरंगत आहे — श्रावणातील पहिल्या मेघासारखी… शांत, गूढ आणि चिरंतन.
☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २४ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆
समाज स्थितीचे वर्णन (२)
जनसामान्यांची साधारण अशी रीत असते की स्वतःतील दोषांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्यांचे दोष दाखवत फिरायचे. म्हणतात ना स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ मात्र चटकन दिसते. अशी माणसे सर्वकाळ असतात. तुकाराम महाराजांच्या काळातही समाजात असे भरपूर लोक होते. त्यांना उद्देशून महाराजांनी ही अभंग रचना केली आहे.
तेचि करो मात/ जेणे होईल तुझे हित//
काय बडबड निमित्य / सुख जिव्हारी सिणवीसी//
जो मूळव्याधी पिडिला/ त्यासी देखोन हसे खरजुला//
अरथ करी सोसी/ त्यासी हसे तो आळशी//
क्षयरोगी म्हणे परता/ सरळ रोगीया कुष्ठिता//
वडस दोन्ही डोळा वाढले/ आणिका *काने कोचे बोले
तुका लागे पाया/ शुद्ध करा आपणिया//
महाराज सामान्य जनाना सांगत आहेत, अरे माणसा उगीच जास्त वटवट करणे थांबव. तुझे हित कशात आहे तेवढे बघ, उगीच जास्त बडबड करून लोकांना त्रास का देतोस? सामान्य परिस्थिती अशी आहे की, जो कोणी मुळव्याधीच्या आजाराने त्रस्त आहे त्याला पाहून खरूज झालेला मनुष्य हसतो. अति श्रम करणाऱ्यांना आळशी मनुष्य नावे ठेवतो. कुष्ठरोग्यास पाहून क्षयरोगी त्याला दूर राहण्यास सांगतो. ज्याच्या दोन्ही डोळ्यात मोतीबिंब पडली आहेत तो दुसऱ्याला चकणा म्हणतो.
महाराजांचे म्हणणे असे आहे की जन हो तुम्ही स्वतःतील दोष, दुर्गुण ओळखून आधी स्वतः शुद्ध व्हा. दुसऱ्याचा धिक्कार करू नका. समाजातील स्वास्थ्य अबाधित राहण्यासाठी ही गोष्ट फार महत्त्वाची आहे.
तुकाराम महाराजांच्या वेळी समाजातील दांभिकता फार वाढली होती. महाराजांच्या हे लक्षात आल्यामुळे देवाला विनंती करणारा असा हा अभंग आहे.
बोल नाही तुझ्या/ दातृत्वपणासी/
आम्ही अविश्वासी/ सर्वभावे//
दम्भे करू भक्ती/ सोंग दावू जना/
अंतरी भावना/ वेगळीया//
चित्ताचा तू साक्षी/ तुज कळे सर्व/
किती करू गर्व/ आता पुढे//
तुका म्हणे देवा/ तू काय करीसी/
कर्मा दुस्तरासी/ आमुचिया//
हे देवा तू उदार आहेस. दाता आहेस. यात काहीच शंका नाही. खरंतर आम्ही दोषी आहोत.
(तुकाराम स्वतःलाही या जनसामान्यातील एक समजतात.) आमचाच तुझ्यावर विश्वास नाही. दांभिकपणे लोकांना दाखवण्यासाठी आम्ही तुझी भक्ती करतो. मनात काहीतरी वेगळेच विचार चालू असतात. तू चित्ताचा साक्षी आहेस, म्हणून सर्व जाणतोस. तुझ्याकडे आम्ही गर्व तरी काय करणार? आणि आमच्या या दुस्तर कर्माला तू तरी काय करणार?
कावळ्याच्या गळा/ मुक्ताफळ माळा/
तरी काय त्याला/ भूषण शोभे//
गजा लागी केला/ कस्तुरीचा लेप/
तिचे तो स्वरूप/ काय जाणे//
बकापुढे सांगे /भावार्थ वचन/
वा उगाची सीण /होय त्यासी//
तुका म्हणे तैसे/ अभाविक जन/
त्यासी वाया सीण / करू नये//
समाजातील अज्ञानी, अभाविक जनांसाठी तुकाराम महाराजांनी या अभंगात जनावरे, पक्षी यांची उदाहरणे देऊन अशा लोकांना भक्तीचे महात्म्य काय सांगावे असा विचार मांडला आहे.
कावळ्याच्या गळ्यात मोत्याचे हार घालून काय शोभा? हत्तीच्या अंगाला कस्तुरीचा लेप लावला तरी त्याचा सुगंध हत्तीला काय कळणार? बगळ्यापुढे आयुष्याचे महत्त्व वाचून, भक्तीचा महिमा सांगून काही फायदा आहे का? विनाकारण त्या प्रवचनकाराला थकवा यायचा. तेव्हा भक्त म्हणून मिरवणारे पण मनात मुळीच भाव नसलेले, अशा लोकांना कोणताही उपदेश करू नये असे महाराज सांगतात.
तुकाराम बुवाना त्यावेळच्या समाजातील मंबाजीबुवांसारख्या लोकांनी खूप त्रास दिला होता. त्यांची गाथा इंद्रायणीत बुडवण्यापर्यंत मजल गेली होती. या संदर्भात हे अभंग महाराजांनी रचले असावेत.
ब्राह्मण म्हणजे वेदोक्त कर्म करणारे. तो त्यांचा अधिकार. तुकाराम महाराजांना भोजनाला बोलविणाऱ्या एका विद्वान ब्राह्मणाला उद्देशून तुकाराम बुवा म्हणतात,
नये माझा तुम्हा होऊ शब्द स्पर्श/
विप्र तुम्ही विद्वांस ब्राह्मणांसी//
म्हणून या तुम्हा करितो विनंती/
धावे शेष हाती उरले ते//
वेदी कर्म जैसे बोलीले विहित/
करावी ते नित विचारूनी/
तुमचा स्वधर्म माझा अधिकार/
भोजन उत्तर तुका म्हणे//
माझा तुम्हाला शरीराने किंवा शब्दानेही स्पर्श होऊ नये, कारण तुम्ही विद्वान, विद्यावंत ब्राह्मण आहात. वेदांमध्ये तुमचे जैविक कर्म सांगितले आहे त्याप्रमाणे आपण करावे. तुमच्या पंक्तीला न बसता तुमच्या भोजनानंतर जे काही उच्छिष्ठ उरले असेल तेवढेच खाण्याचा माझा अधिकार आहे. आणि वेदोक्त कर्म करणे हा तुमचा स्वधर्म आहे. उपरोधिक असे हे वरील अभंग आहेत.
माणसातील चांगले गुण बघावे, जात- कुळीला अवास्तव महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. समाजातील उच्चनीचता भाव दूर व्हावा यासाठी रोजच्या जीवनातील दृष्टांत देऊन या अभंगात महाराज काय सांगतात?
आपणा लागे काम वाण्या घरी गुळ/
त्याचे याती कुळ काय कीजे//
उकीरड्यावरी वाढली तुळसी/
गाईचा टाकावी ते कैसी ठाया गुणे//
गाईचा जो भक्ष अमंगळ खाय/
तिचे दूध काय सेवू नये//
तुका म्हणे काय सालपटाशी काज/
फणसातील बीज काढुनी घ्यावे//
वाण्याच्या घरचा गुळ आपल्याला हवा आहे, तर त्यासाठी त्याची जात कुळी का विचारावी? तुळस उकिरड्यावर उगवली तरी ती पवित्रच असते. गाय अशुद्ध वस्तू खाते, पण आपण तिचे दूध पितो ना? फणसाचे साल काटेरी असले तरी आपला मतलब आतील गोड गरे खाण्याचाच! थोडक्यात काय तर गुणदोष युक्त कोणत्याही वस्तूतील दोषांकडे दुर्लक्ष करून त्यातील गुण तेवढे घ्यावे हेच खरे.
ब्राह्मणांसारख्या श्रेष्ठ कुळात जन्म घेऊन कुळ भ्रष्ट करणारेही असतात.
अंगी ब्रह्म क्रिया/ ख्रिस्ती चा व्यापार/
हिंडे घरोघर / चांडाळाचे//
अंतेजाची खिचडी/ घेता ती मागून/
गाळीया प्रदान/ माय बहिणी//
उत्तम कुळी जन्म/ क्रिया अमंगळ/
बुडविले कुळ/ उभयता//
तुका म्हणे ऐसी /कलियुगाची चाली/
स्वार्थी बुडवली/ आचरणे//
काही ब्राह्मण असे असतात की, ब्रह्मकर्म न करता सावकारी करतात, आणि वसुलीसाठी चांडाळांच्या घरी जातात. महारांकडून कधीकधी पोट भरण्यासाठी खिचडी आणतात आणि व्यापारा निमित्त माय बहिणींवरून शिव्या देतात. असे ते उत्तम कुळात जन्मलेले असूनही त्यांचे कर्म अमंगळ असते. या कलियुगात अशी वागणूक सर्वत्र दिसून येते. स्वार्थ वाढला आहे, त्यामुळे शुद्ध आचरण भ्रष्ट झाले आहे.
पापाचीया मुळे/ झाले सत्याचे वाटोळे/
दोष झाले बळीवंत/ नाही ऐसी झाली नीत//
मेघ पडो भीती/ पिके सांडीयेली क्षीती/
तुका म्हणे काही/ वेदा वीर्य शक्ती नाही//
या कलियुगात पापे फार वाढली. सत्याचा ऱ्हास झाला. नीती भ्रष्ट झाली, दोष वाढले. दुष्काळ पडू लागले, निसर्ग कोपला. अधर्मामुळे वेदमंत्रातील बळ नष्ट झाले.
आज आपण अशाच परिस्थितीला सामोरे जात आहोत. आतंकवाद वाढला आहे. मुलगा वडिलांना विचारेनासा झाला आहे. प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार चालू आहे. माणसातले माणूसपण हरवते आहे…
परिस्थिती सुधारणे आपल्याच हातात आहे, याचा आपण विचार केला पाहिजे.
माझ्या अजाण वयापासूनच्या विविध टप्प्यांवरचे हे सगळे अनुभव ‘त्या’चा कृपालोभ म्हणजे काय याची पुन्हा नव्याने प्रचिती देणारे साक्षात्कारच होते माझ्यासाठी!
‘देव’ ही मानवनिर्मित संकल्पना आहे. तो अस्तित्वातच नसतो. तो आहे असं मानणं हा एक भ्रम आहे’ असं आग्रहाने सांगणाऱ्यांची भूमिका माझं वय वाढत गेलं तसं अनेकदा ऐकता, वाचताना माझ्या मनात संभ्रम नाही पण प्रश्न मात्र निर्माण करायचीच. पण त्या प्रश्नांची उत्तरं अट्टाहासानं लगेचच मिळवावीत आणि ती टोकाची मते खोटी ठरवावीत अशी असोशी माझ्या मनात कधी निर्माण झाली नाही तरी त्यातलं तथ्य समजून घ्यावं असं, माझं वाचन वाढत गेलं तसं मला मनापासून वाटू लागलं हेही खरंच. हे समजून घ्यावं असं वाटणंच पुढे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यात असणारी पुसटशी अंधूक रेषा माझ्यापुरती अधिकाधिक ठळक व्हायला निमित्त झाली. अर्थातच हे सगळं एका क्षणात घडून गेलेलं नाही. तरीही ते घडायला निमित्त झालेले एक एक क्षण मात्र मी समतोल मनाने स्वीकारल्यामुळे माझ्यासाठी ते हितकारक ठरले एवढं मात्र नक्की. या संदर्भातला एक प्रतिनिधिक अनुभव पुढे लिहिण्याच्या ओघात येईलच.
सुरुवातीच्या माझ्या अनुभवांबद्दल यापूर्वी सविस्तर लिहिल्याप्रमाणे माझ्या नकळत्या अजाण वयातच माझ्या बालमनात आजुबाजूचं वातावरण आणि घरातले संस्कार यामुळे माझ्याही नकळत ‘त्या’ची प्रतिष्ठापना झालेली होती! त्याची जाणिव अर्थातच पुढे आयुष्यातल्या कसोटी पहाणाऱ्या असंख्य प्रसंगांमध्ये हळूहळू दृढ होत गेली.
माझ्या मनातलं ‘त्या’चं हे आश्वासक अस्तित्व माझ्या आजवरच्या जीवनप्रवासातला माझा श्वासच कधी आणि कसं बनलं ते मलाच समजलं नव्हतं! तोच श्वास पुढे माझी घुसमट व्हायची वेळ आलेल्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगात माझ्यासाठी संजीवक ठरत असायचा! !
‘श्रध्दा’ म्हणजे तरी वेगळं काय असतं? ‘तो’ आहे हा मनोमन असणारा ठाम विश्वास म्हणजेच तर श्रध्दा! ‘देव’ आहे की नाही हा संभ्रम माझ्या मनात निर्माण व्हायची वेळ जशी कधीच आली नाही तसेच ‘तो’ आहे हे इतरांना अट्टाहासाने पटवून द्यावे असंही मला कधी वाटलं नाही.
खरंतर देवाचं अस्तित्व मानणं किंवा न मानणं हा माझ्यापुरता मी ज्याचा त्याचा प्रश्नच मानला. म्हणूनच असेल कदाचित पण जवळचे अनेक मित्र आणि नातेवाईक नास्तिक असूनही आमचे परस्परसंबंध सलोख्याचेच राहिले. किंबहुना माझ्या मनातली श्रद्धा तिच्यावर अंधश्रद्धेची सावली पडू न देता अलवारपणे जपणं मला त्या सर्वांमुळेच सुलभ झालं असं मला मनापासून वाटतं.
माझ्या मनातल्या या श्रद्धेचं एरवीच्या दैनंदिन जीवनात मला कधीच प्रदर्शन करावं असं वाटलं नाही. कारण माझी श्रध्दा ही माझ्या हाडामांसासारखीच एक नैसर्गिक गोष्ट आहे असंच मला वाटायचं. त्यात आवर्जून मिरवावं असं वाटण्याचा प्रश्नच नव्हता.
मी जसा कधी कर्मकांडात रुतलो नाही तसंच माझ्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यं हेच माझे सतत प्राधान्यक्रम राहिले. त्यामुळे अट्टाहासाने अध्यात्मिक ग्रंथांचं वाचन आवर्जून करावं अशी ओढ मला असोशीने कधी वाटलीच नाही. त्यांचं वाचन झालं ते केवळ गरजेनुसार संदर्भ पहाण्यापुरतंच. तरीही लेखनाइतकीच मला वाचनाचीही आवड होती आणि त्या वाचनात नकळत आलेल्या विविधतेमुळे मी त्या त्या वेळी आत्मपरीक्षण करायला प्रवृत्त झालो हे आवर्जून सांगायलाच हवं!
अगदी योगायोगाने वाचनात आलेलं ‘साद देती हिमशिखरे’ हे श्री जी. के. प्रधान यांचे पुस्तक मला प्रभावित करून गेले होते. श्री. हिराभाई ठक्कर यांच्या ‘कर्माचा सिद्धांत’ आणि ‘मृत्यूचे महात्म्य’ या पुस्तकांनी अतिशय मौलिक असं जगण्याचं आणि मृत्यूचंही महत्व मला समजून सांगितलेलं होतं. श्री. संजय पंडित यांच्या ‘मनाचे व्यवस्थापन’ या पुस्तकाने माझ्या मनातली श्रद्धा तपासून पहायला मला प्रवृत्त केले आणि पुढेही माझ्या विचारांना योग्य दिशा देण्याचे कामही केले. श्री नरेंद्र दाभोळकरांच्या ‘श्रद्धा आणि अंधश्रद्धा’, ‘भ्रम आणि निरास’, ‘उच्चाटन अंधश्रद्धेचे’ यासारख्या पुस्तकांनीही माझ्या मनातील श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या दरम्यान असणारी पुसट रेषा अधिक ठळक केली. हे सगळंच मला समृध्द करायला निमित्त ठरलेलं आहे!
श्रद्धेवर नकळत पडणारं अंधश्रद्धेचं सावट हळूहळू अधिक गडद होत जाण्याची प्रक्रिया सद्सदविवेकाच्या टोचणीनंतरही आपण सजगतेने थोपवू शकलो नाही तर मनातली श्रद्धा प्रदूषित व्हायला आपोआपच सुरुवात होते. हे अशिक्षितांच्या बाबतीतच नाही तर शिकलेल्या, सुजाण म्हणवणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीतही नकळत कां होईना पण सर्रास घडत असते. यासंदर्भातला माझा एक अनुभव आवर्जून सांगायलाच हवा असं मला वाटतं. तो तसा अगदी साधाच अनुभव पण आपली त्याकडे पहाण्याची दृष्टी स्वच्छ असली तर साध्या साध्या गोष्टीही आपल्याला बरंच कांही शिकवून जातात याचा प्रत्यय देणारा!
माझं पोस्टिंग कोल्हापूर ब्रँचला होतं तेव्हाचा हा प्रसंग. साधारण १९७८-७९ दरम्यानचा. तिथे एकात एक अशा तीन खोल्यांच्या भाड्याच्या जागेत आमचं बि-हाड होतं. रोजची देवपूजा म्हणजे फुले हवीतच. त्याशिवाय पूजा कशी पूर्ण होणार? हाच विचार तेव्हाच्या अननुभवी वयात माझ्या मनात खोलवर रुजलेला होता. आणि ती जागाच अशी होती की निदान एखाद्या कुंडीत फुलझाडाचं रोप लावावं एवढीही जागा घराभोवती कुठे नव्हतीच. त्यामुळे पूजेसाठी फुलपुडी लावण्याशिवाय पर्यायच नव्हता. आणि त्यात मला कांही गैरही वाटलं नव्हतं. फुलवाला पहाटेच कधीतरी फुलपुडी आणून शटरमधून आत टाकून जायचा. त्यामुळे सकाळी उठल्यावर चूळ भरुन मी आधी फुलवाल्याने टाकलेली ती फुलपुडी आत आणून ठेवायचो. रोजच्याप्रमाणे त्या दिवशी सकाळी ती फुलपुडी आत आणायला मी गेलो तर मला ती कुठे दिसेचना. नीट पाहिल्यावर लक्षात आलं की ती फुलपुडी बंद दाराच्या जवळच ठेवलेल्या छोट्या शूज स्टॅंडवरच्या माझ्या बुटाच्या खाचेत पडलीय. मी नाराज झालो. पण तरीही ती फुलपुडी उचलून आत आणली आणि त्या फुलांवर पाणी शिंपडून फुलं तबकात नेऊन ठेवली. आंघोळ आवरून पूजेला बसलो. देव पुसून ताम्हनात ठेवले. गंध लावलं. आणि नेहमीच्या सवयीनं देवाला वाहण्यासाठी तबकातली फुले हातात घेतली. आणि… क्षणभर थबकलो. ती फुलं देवाला वाहावीत असं वाटेचना. हातातली फुलं तशीच परत तबकात ठेवली. देवाला फक्त हळद-कुंकू वाहिलं आणि निरांजन लावून नैवेद्य दाखवला. कांहीतरी निसटून गेल्याची रुखरुख मात्र मनात होती पण क्षणभरच. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधली पुसट रेषा ओळखण्याचा तो क्षण होता. एरवी बुद्धीमुळे भ्रम होतो म्हणतात. पण माझ्या बुद्धीनेच त्या क्षणी ती रेषा नकळत ओलांडू पहाणाऱ्या माझ्या मनाला सावरलं. योग्य आणि अयोग्य यांच्यातल्या फरकाची नेमकी जाणीव करून दिली. पूजेला फुलं न मिळाल्याने मनाला झालेली नाराजी बुद्धीनं अलगदपणे दूर केली. हे अयोग्य आहे हे पटवून दिलं. केवळ उपचारापेक्षा शुचिर्भूतता महत्त्वाची आहे हे समजावून सांगितलं. आणि मग मनातली रुखरुख विरून गेली. मन शांत झालं. मी अलगद डोळे मिटले. हात जोडले. आणि अतिशय नम्रपणे ‘त्या’ला सांगितलं,.. ‘देवा, आता उद्यापासून तुझी रोजची पूजा ही अशीच. जेव्हा केव्हा माझ्या दारात एखाद्या लहानशा कुंडीत कां असेना पण चार-दोन फुलं फुलतील तेव्हाच मी ती तुला वाहिन. “
पुढे जवळजवळ पंधरा- सोळा वर्षांनंतर १९९३ साली आम्ही सांगलीतल्या गावभागातल्या आमच्या स्वतःच्या फ्लॅटमधे रहायला गेलो तेव्हा बाल्कनीतल्या कुंड्यांमधे निशिगंध लावला. आवर्जून लावलेल्या निशिगंधाला लगडलेल्या शुभ्र सुवासिक फुलांची ओंजळ भक्तियुक्त अंत:करणाने मी जेव्हा ‘त्या’च्या चरणी प्रथम वाहिली, तेव्हा मनाला स्पर्शून गेलेली सुखसंवेदना माझ्या मनाला आत्यंतिक उल्हसित करुन गेली होती!
२००६ पासून आम्ही हरिपूर रोडवरील ‘त्रिदल’ या आमच्या नवीन वास्तूत रहायला आलो. आता सभोवतालच्या प्रशस्त बागेत विविध रंग, रूप, वासांच्या फुलांनी दोन-तीन मोठ्या परड्या तुडुंब भरतील एवढी फुले रोज मिळतात आणि तेवढीच झाडावेलींवर शिल्लकही असतात. त्या ताज्या टवटवीत फुलांचे वाटे कितीतरी परिचितांच्या घरच्या देवघरांमधल्या आणि जवळच्या मंदिरामधील ‘त्या’च्यापर्यंत रोज पोचतात आणि कृतार्थता म्हणजे काय याचा अर्थ यथार्थपणे मनाला स्पर्शून जातो! देणाराही तोच असतो आणि घेणाराही तोच! पण त्यात आपलं असं निमित्तमात्र असणंही किती सुखदायी असतं याच्या अनुभव मला रोज नव्याने येतो आहे! !
‘त्या’ला एकदा मनोमन मानल्यानंतर नकळत सुरू झालेल्या ‘त्या’ला जाणण्याच्या प्रक्रियेतील या सगळ्या वाटा आणि वळणे! या प्रवासात या प्रत्येक टप्प्यावर ‘तो’ माझ्याबरोबर असायचाच. त्यामुळे अनेकांना पडतात तसे ‘तो कोठे आहे? ‘ ‘कसा आहे? ‘ हे प्रश्न मला कधीच पडायचे नाहीत. ‘तो’ आहे हेही माझ्यापुरतंच असायचं! इतरांनीही ते स्वीकारावं असं मला कधीच वाटलं नाही. मी माझ्याही नकळत जीवनाचं गणित सोडवण्यासाठी माझ्या नकळत्या वयापासून ‘त्या’चं असणं हे असं एक गृहीतच मानत आलो. आज हे गृहीत चुकलेलं नाहीय याची आजवरच्या अनुभवांती मला पूर्ण खात्री पटल्यानंतर आपल्या जीवनाचं गणित अचूक सुटणार याचा पूर्ण विश्वास मला वाटतो आहे!
‘तो’ माझ्याच नव्हे तर प्रत्येकाच्याच मनामनात अंश रुपाने असतोच. म्हणूनच ‘त्या’ला अंतर्यामी म्हणतात ना? ‘त्या’चं रंगरुप त्या प्रत्येकाच्या श्रध्दा आणि विचारांनुरुप वेगवेगळं असतं एवढंच. त्या वेगवेगळ्या रुपातला ‘तो’ प्रत्येक आस्तिकाच्याच नव्हे तर नास्तिकाच्या मनातही असतोच. त्यातील कुणाला त्याची जाणिव असो वा नसो. केवळ असा प्रत्येकाच्या अंतर्यामीच नव्हे तर चराचरातल्या प्रत्येक कणाकणात अंशरुपाने भरुनसुध्दा ‘तो’ वर अंगुलीभर उरतोच! !
‘त्या’च्याच साक्षीने मी माझ्या मनातल्या ‘त्या’चा आजवर घेतलेला हा मागोवा!
या निमित्ताने माझ्या ओंजळीत साठलेली ही सगळी सुगंधी शब्दफुले मी आज अतिशय विनम्र आणि कृतज्ञभावाने ‘त्या’च्याच चरणी अर्पण केलीयत हीच भावना याक्षणी माझ्या मनात आहे!
फिफा (FIFA) फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबाॅल असोसिएशन ही विश्वचषक सामने खेळवणारी संस्था आहे.
हे विश्वचषक सामने दर चार वर्षांनी खेळले जातात.
या वर्षी 11जून ते 19 जुलै 2026 या दिवसात खेळले जातील. हे सामने कॅनडा, मेक्सिको, आणि युनायटेड स्टेट्स् येथे खेळले जाणार आहेत. कॅनडामध्ये प्रथमच सामना होतो आहे. 1998 पासून 32 देशातले खेळाडू भाग घेत होते. 2026 ला 48 देश क्वालिफाय झाले आहेत. एकूण 104 सामने खेळले जातील.
काबो वेर्दे, कुरकाओ, जाॅर्डन आणि उझबेकिस्तान हे चार संघ प्रथमच भाग घेत आहेत. युकेचे इंग्लंड आणि स्काॅटलंड हे दोनच संघ सामील होतील.
48 संघ सोळा भागात विभागून सामने खेळले जातील. अंतिम निर्णायक सामना न्यू जर्सी (अमेरिका) येथे मेटलाईफ स्टेडियमवर 19 जुलैला खेळला जाईल. 2022 वर्षी अर्जेंटिना व फ्रान्स यांच्यात अंतिम सामना खेळला गेला, तो अर्जेंटिनाने जिंकला होता.
पहिला विश्वचषक फुटबाॅल सामना 1930 साली उरुग्वे येथे खेळला गेला. तेव्हा 13 संघांनी भाग घेतला होता.
यानंतर पुढच्या चार वर्षांनी म्हणजे 2030 ला हे सामने मोरोक्को, पोर्तुगाल, आणि स्पेन येथे खेळले जातील. 2030 हे वर्ष या विश्वचषक सामन्यांचे 100 वे वर्ष असेल. विश्वचषक शतकपूर्तीचा मान म्हणून यातील एक सामना उरुग्वेच्या ईस्तादियो सेंटेनरी स्टेडियमवर खेळला जाईल.
विजेत्याला सन्मानाने, गौरवाने देण्यात येणारा कप हा सुवर्णचषक असतो. तो 3. 5 फूट उंच आणि त्याचे वजन 6. 2 किलो असते. त्याची किंमत 15 मिलियन पौंड म्हणजे भारतीय चलनात करायची तर असते दीडशे करोड रुपये.
पण विजेते ही ट्राॅफी घेऊन जात नाहीत, ती स्वित्झर्लंडच्या FIFA म्युझियम मध्ये ठेवली जाते. विजेत्या प्रत्येक खेळाडूला ब्राॅन्झची प्रतिकृती दिली जाते.
खेळाडूंची धावण्याची शारिरीक क्षमता, स्थिर आणि बळकट मन, समान गोल असताना पुढचा गोल करण्यासाठी लागणारी सांघिक एकात्म शक्ती, विरुद्ध संघातला खेळाडू बाॅल कुठल्या दिशेने कुठे पास करतो त्याप्रमाणे बाॅल गोलपोस्टकडे ठोकणे याला शारिरीक हालचाली आणि मेंदूची अतिशय तत्परतेची क्षमता लागते, तसेच गोलरक्षकाची येणा-या बाॅलचा अंदाज घेण्याची ताकद, मांजरासारखी धारदार नजर, चित्त्यासारखी झप् कन उडी घेण्याची चपळता
आणि सर्वात महत्वाचे, प्रत्येक सामना आणि विश्वचषक जिंकण्याची प्रचंड आणि जबरदस्त इच्छा हेच खेळाचे वैशिष्ट्य!
खेळाडूंच्या बरोबरीने पळणारा रेफरी हा तर प्रेक्षकांचे लक्ष वेधणारा आणि खेळातला महत्वाचा दुवा.
खोडकर, रागीट, पळताना पायात पाय घालून पाडणा-या खेळाडूला एका शिट्टीवर बाहेरचा रस्ता दाखवणारा मास्तरच!
टीव्हीवर सामना बघताना सरासर धावणारे खेळाडू, रेफरी, गोलरक्षक, मध्येच धडाडकन् पडणारे धावक आणि एकत्र आवाजाने आणि टाळ्यांनी प्रोत्साहन देणारे प्रेक्षक हा सगळा नजारा बघायला आणि सामन्याचा थरार अनुभवायला तयार राहूया.
लिओनेल मेस्सी, पेले, रोनाल्डो, डायगो माराडोना यांची आठवण करत, चला तर, 11 जून पासून विश्वचषक फुटबाॅल सामन्यांचा आनंद घेऊया.
☆ “भावनांचे पोषण करते नातेसंबंधांचे रक्षण” ☆ श्री जगदीश काबरे ☆
मानवी नातेसंबंधांचा पाया हा केवळ करार, जबाबदाऱ्या किंवा एकत्र राहण्याच्या व्यवस्थेवर उभा नसतो; तर तो अनेकदा न दिसणाऱ्या पण सतत अनुभवता येणाऱ्या भावनिक प्रवाहांवर आधारलेला असतो. नात्यांमधील ऊब, जिव्हाळा आणि आपुलकी या गोष्टी प्रत्यक्षात भावनांच्या सातत्यपूर्ण देवाणघेवाणीमुळे निर्माण होतात. परंतु आधुनिक सामाजिक संरचनेत, विशेषतः बदलत्या विवाह आणि कुटुंब व्यवस्थेत, या भावनांची जागा हळूहळू व्यवहारिकता आणि व्यक्तिकेंद्रित जीवनशैली घेताना दिसते आहे. परिणामी, नाती ‘राहतात’ पण ‘जगली’ जात नाहीत. म्हणून आधुनिक समाजात नातेसंबंधांचा बाह्य आविष्कार जरी पूर्वीइतकाच टिकून असल्याचे दिसत असले, तरी त्यांच्या अंतर्गत आशयात खूप मोठे बदल घडत आहेत. विवाह, कुटुंब आणि सामाजिक नाती या सर्वांचा पाया भावनांवर उभा असतो. ही एक मूलभूत सामाजिक गरज आहे. मात्र आजच्या बदलत्या जीवनशैलीत, वेगवान शहरीकरणात आणि भौतिक प्रगतीच्या अतिरेकात या भावना हळूहळू क्षीण होत चालल्याचे स्पष्टपणे दिसतेय. ‘कुपोषण’ ही संकल्पना आपण सहसा शरीराशी, अन्नाशी जोडतो; परंतु भावनांचेही कुपोषण होऊ शकते, ही जाणीव अद्याप सामाजात चर्चेत फारशी ठळकपणे आलेली नाही. जसे शरीराच्या पोषणासाठी योग्य अन्न, योग्य वेळ आणि संतुलीत आहार आवश्यक असतो, तसेच नात्यांना टिकवण्यासाठी भावनांचे पोषण होणे आवश्यक असते. परंतु आजच्या धावपळीच्या जीवनपद्धतीत या भावनिक पोषणाचा अभाव प्रकर्षाने जाणवायला लागलाय.
यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे चंगळवादाचा वाढता प्रभाव. आर्थिक प्रगती, उपभोगवादी संस्कृती आणि ‘सर्व काही पैशाने मिळू शकते’ हा दृष्टिकोन समाजात खोलवर रुजत चालला आहे. यामुळे आनंदाची व्याख्या बदलली आहे. पूर्वी नात्यातून मिळणारा आनंद, सान्निध्य, आपुलकी आणि परस्पर आधार यांना जे महत्त्व होते, त्यांची जागा आता वस्तू, सुविधा आणि वैयक्तिक यश यांनी घेतली आहे. परिणामी, माणूस नात्यांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी भौतिक साधनांमध्ये गुंतवणूक करू लागला आहे. ही गुंतवणूक तात्पुरता आनंद देऊ शकते, पण ती नात्यांमधील उब निर्माण करू शकत नाही. म्हणूनच नात्यांमध्ये ‘भावनिक कुपोषण’ निर्माण झाले तरी नात्याचे बाह्य स्वरूप वरवर टिकून राहिलेले दिसते. अंतर्गत ऊब आणि जिव्हाळा मात्र हरवलेला असतो. वाणी, कृती आणि स्पर्श या मानवी संवादाच्या मूलभूत माध्यमांमधून भावना व्यक्त होत असतात. माया, ममता, आस्था, सहसंवेदना, ओढ, क्षमा, संयम, आदर आणि कौतुक या केवळ शब्दरूप भावना नाहीत, तर ते नात्यांना पोसणारे घटक आहेत. परंतु आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात प्रत्यक्ष संवाद कमी होत चालला आहे. डिजिटल माध्यमांमधून होणारा संवाद हा माहितीपुरता मर्यादित असतो; त्यात भावनिक सूक्ष्मता कमी असते. ‘इमोजी’ आणि ‘मेसेज’ यांच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या भावना प्रत्यक्ष स्पर्श, आवाजातील ऊब किंवा नजरेतील आपुलकी यांची जागा घेऊ शकत नाहीत. परिणामी, नात्यांमध्ये भावनिक अंतर वाढते. हे अंतर हळूहळू तुटकपणात परिवर्तित होत जाते. अशाप्रकारे डिजिटल युगातील संवादाच्या बदलत्या स्वरूपानेही या प्रक्रियेला वेग दिला आहे. सोशल मीडियावरचे आभासी संबंध, तत्काळ प्रतिसादाची सवय आणि सततच्या व्यस्ततेमुळे प्रत्यक्ष संवादाची गुणवत्ता कमी होत चालली आहे. ‘कनेक्टेड’ असण्याचा भास असला, तरी ‘कनेक्शन’ची खोली कमी होत आहे. भावनांची अभिव्यक्ती शब्दांपलीकडे असते… ती आवाजाच्या टोनमध्ये, नजरेत, स्पर्शात आणि उपस्थितीत दिसते. परंतु जेव्हा संवाद प्रामुख्याने डिजिटल माध्यमातून होतो, तेव्हा या सूक्ष्म अभिव्यक्ती हरवतात. परिणामी, नात्यांमध्ये एक प्रकारची पोकळी निर्माण होते, जी अनेकदा व्यक्तींना स्वतःलाही स्पष्टपणे जाणवत नाही, पण ती त्यांच्या वर्तनात आणि भावनिक स्थितीत प्रतिबिंबित होते.
विवाहसंस्था ही दोन स्वतंत्र व्यक्तींच्या भावनिक आणि सामाजिक करारावर आधारलेली असते. या कराराचा गाभा ‘भावबंध’ हा असतो. दोन व्यक्ती एकत्र येतात, तेव्हा त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याला धक्का न लावता, परस्पर समजूत, सहानुभूती आणि जिव्हाळा यावर नातं उभं राहतं. परंतु जेव्हा या भावनांमध्ये अभाव निर्माण होतो, तेव्हा नातं केवळ औपचारिक उरतं. ‘बंध’ टिकवण्यासाठी ‘भाव’ आवश्यक असतात; अन्यथा ते नातं केवळ सामाजिक बंधन बनून राहते. अशा परिस्थितीत संघर्ष, गैरसमज आणि तणाव वाढण्याची शक्यता अधिक असते. कारण भावनिक आधार नसताना कोणतेही नाते दीर्घकाळ टिकू शकत नाही. कौटुंबिक नात्यांमध्येही हाच बदल दिसून येतो आहे. एकत्र कुटुंबपद्धतीपासून लहान कुटुंबपद्धतीकडे झालेल्या संक्रमणामुळे व्यक्तींचे स्वातंत्र्य वाढले असले, तरी त्याचबरोबर भावनिक आधार कमी झाला आहे. पूर्वी कुटुंबातील विविध सदस्यांमधील संवाद, सण-उत्सव, एकत्रित वेळ घालवणे यामधून भावनिक बंध दृढ होत होते. आता मात्र प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या जगात व्यस्त आहे. कामाचा ताण, वेळेची कमतरता आणि वैयक्तिक प्राधान्ये यामुळे नात्यांना वेळ देणे दुय्यम ठरते आहे. परिणामी, नात्यांमध्ये औपचारिकता वाढतेय आणि जिव्हाळा कमी होतोय. या बदलांचा समाजातही व्यापक परिणाम दिसून येतोय. जेव्हा व्यक्तीला जवळच्या नात्यांमध्येच भावनिक समाधान मिळत नाही, तेव्हा त्याचा परिणाम समाजातील एकात्मतेवर होतो. सहसंवेदना, परस्पर मदत, सामाजिक जबाबदारी या मूल्यांचा ऱ्हास होतो. माणूस अधिक आत्मकेंद्रित बनतो. ही प्रवृत्ती समाजात तणाव, असुरक्षितता आणि एकटेपणा वाढवते. म्हणूनच भावनिक कुपोषण हा केवळ वैयक्तिक किंवा कौटुंबिक प्रश्न नसून तो एक व्यापक सामाजिक प्रश्न आहे. कारण कुटुंब हे समाजाचे मूलभूत एकक आहे, आणि कुटुंबातील नात्यांची गुणवत्ता समाजाच्या आरोग्यावर थेट परिणाम करते. जेव्हा कुटुंबातील सदस्य भावनिकदृष्ट्या तुटक होतात, तेव्हा त्याचा परिणाम त्यांच्या सामाजिक वर्तनावर, कामाच्या ठिकाणी असलेल्या संबंधांवर आणि व्यापक सामाजिक संवादावर होतो. सहसंवेदनेचा अभाव, असहिष्णुता, आणि वाढती एकाकीपणाची भावना हे सर्व या भावनिक कुपोषणाचेच परिणाम आहेत.
या पार्श्वभूमीवर, भावनांचे ‘अन्नग्रहण’ कसे करावे, याचा विचार करणे आवश्यक ठरते. जसे शरीराला संतुलित आहाराची गरज असते, तसेच नात्यांना नियमित आणि जाणीवपूर्वक भावनिक गुंतवणुकीची गरज असते. संवादासाठी वेळ देणे, एकमेकांचे ऐकून घेणे, कौतुक करणे, चुका स्वीकारून क्षमा मागणे आणि देणे, स्पर्शातून आपुलकी व्यक्त करणे, या सर्व गोष्टी भावनिक पोषणाचा भाग आहेत. या कृती कृत्रिम किंवा औपचारिक नसून नैसर्गिक आणि मनापासून असल्या पाहिजेत. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. कारण नात्यांची खरी ताकद ही त्यांच्या भावनिक गाभ्यात असते. बाह्य यश, संपत्ती किंवा सामाजिक प्रतिष्ठा या गोष्टी नात्यांना टिकवू शकत नाहीत. त्या केवळ पूरक असू शकतात. नात्यांचा पाया मजबूत ठेवायचा असेल, तर त्यात भावनांचे पोषण आवश्यक आहे. ‘भाव’ आणि ‘बंध’ यांचा परस्परसंबंध लक्षात घेतला, तरच बदलत्या काळातही नात्यांची उब टिकवता येईल. अन्यथा, नाती केवळ अस्तित्वात राहतील, पण त्यात जिवंतपणा नसेल, आणि हेच भावनिक कुपोषणाचे सर्वात मोठे लक्षण ठरेल. त्यामुळे भावनांचे पोषण ही केवळ वैयक्तिक गरज नसून, सामाजिक आरोग्य टिकवण्यासाठीची एक अत्यावश्यक अट आहे.
‘परकायाप्रवेश’ हा शब्द आपल्या नेहमीच्या वापरात अजिबात नाही. पुराणकथात, गोष्टीत कधीतरी ऐकलेला, वाचलेला. अलीकडेच नीना कुलकर्णी यांचे ‘अंतरंग’ वाचत होते. ‘अंतरंग’ हा लोकसत्तेतील अंतरंग या सदरात त्यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह आहे. त्यामध्ये एका लेखात नाटकातील काम हा परकाया प्रवेश असतो असे वाचले. आणि माझे मनात विचारांचे काहूर उठले.
स्वतःचा देह बाजूला ठेवून आत्मरूपाने दुसऱ्याच्या देहात केलेला प्रवेश म्हणजे परकाया प्रवेश. हा काही काळापुरता असतो. पण प्रवेश केलेल्या व्यक्ती सारखे वागणे, बोलणे साधावे लागते. परकायाप्रवेश ही एक सिद्धि आहे. खरंच नट तरी वेगळे काय करतो? जी भूमिका त्याला वटवायची असते तिला योग्य कपडे तो धारण करतो. त्याला योग्य चेहरा रंगवून घेतो. त्या भूमिकेचे वागणे, बोलणे, हालचाली आत्मसात करतो. तिचे जीवनच तो आपल्या पुढे उभे करतो. त्या पात्राच्या भावना हालचालीतून, चेहऱ्यावरील भावातून व्यक्त करण्यासाठी तो नट आपला मूळचा व्यवसाय, गुण, रूप, घरदार, वागणूक काही काळा पुरते का होईना विसरतो. असे त्या नाटकातील भूमिकेशी एकरूप होणे म्हणजेच पर काया प्रवेशच नाही का? काही काळापुरता, नाटकाच्या तीन तासा पुरता. असे साधले तरच लोक भूमिका चांगली वठली म्हणून कौतुक करतात. येथे तरुणाचा म्हाताऱ्यात, राजाचा भिकाऱ्यात किंवा तरुणाचा तरुणीत परकायाप्रवेश होत असतो.
सिनेमा, सिरीयल ची गोष्ट थोडी वेगळी असते. तिथे अभिनय साधला नाही तरी रीटेक असतो व समोर प्रेक्षक नसतात. पण नाटक म्हणजे प्रेक्षकांसमोर केलेला जिवंत पर कायाप्रवेश.
आणखी विचार करता, असे लक्षात आलं एखाद्या व्यक्तीविषयी लिहिताना त्या व्यक्तीशी एकरूप व्हावं लागतं. स्वतःला बाजूला ठेवून, त्या व्यक्तीचे विचार, बोली, मते यांचा विचार करावा लागतो. त्या भूमिकेत शिरलं तरच ते शब्दचित्र रंगवता येत. हीच गोष्ट काव्य निर्मितीचे बाबतीत असते. कवी जेव्हा आपल्या सर्व कथा- व्यथा बाजूला ठेवतो, तेव्हाच रसदार, सत्य, काव्य निर्माण होतं. असा हा परकाया प्रवेशाचा अर्थ मी लावला. तो सोपा नसतो. कवी, लेखकांना तो साधतो. दुसऱ्याच्या अंतरंगात त्यासाठी प्रवेश करावा लागतो. मग पक्षी, वारा, झाडे यांच्या मनातले कळते.
एखाद्या व्यक्तीच्या आत्म्याचा दुसऱ्याच्या शरीराच्या प्रवेश ही सिध्दी श्री शंकराचार्य याना साध्य होती. म्हणूनच मंडण मिश्र यांच्या पत्नीने शंकराचार्यांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी परकाया प्रवेश केला होता. अशा आणखीही गोष्टी सांगतात.
आपण एवढे समजू शकतो की वर्णन करावयाच्या वस्तूचे, व्यक्तीचे गुणदोष, सुख, दुःख व्यक्त करण्यासाठी त्याच्याशी एकरूप व्हावे लागते. स्वतःला काही काळ विसरावे लागते. हाच परकायाप्रवेश. लेखकांच्या कवींच्या मध्ये सहजच हा गुण असतो. म्हणून त्यांचे लिखाण, हावभाव हृदयाला भिडतात, मनाला भावतात.
☆ “अफेेअर आणि करंट अफेअर…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
काही वेळा काही शब्द फार जपून वापरावे लागतात. आपल्या मनातला अर्थ आणि समोरच्याने त्याचा घेतलेला अर्थ यात गफलत झाली की संपलच. शहाणा, वेडा हे असे काही शब्द आहेत की ते कोणत्या परिस्थितीत वापरले जातात त्यावर त्याचा अर्थ लक्षात येतोच. यात कधी चांगला अर्थ असतो, तर कधी तो टोमणा असतो. तसाच अर्थ करंट अफेअर या एकत्र केलेल्या शब्दात जाणवला.
आपण नक्की कोणत्या गोष्टीचा विचार करतो त्यावर अर्थ अवलंबून असतो. पण दोन वेगळ्या व्यक्ती वेगळा विचार करत असतील तर वापरल्या जाणाऱ्या शब्दाच्या अर्थात गोंधळ होतो. असच काहीसं मी आणि माझा मित्र यात झालं.
अफेअर आणि करंट अफेअर. असलेेली लफडी आणि सध्या चालू असलेल्या घडामोडी यात गोंधळ झाला. अफेअर खाजगी आयुष्याच्या संबंधी असतं, तर करंट अफेअर याचा संबंध देशात, जगात घडणाऱ्या, सुरु असलेल्या घडामोडी याच्याशी असतो. जे उघड असतं.
आम्ही भेटलो तेव्हा मी सध्या सुरु असलेल्या युध्दाच्या बातम्या पाहिल्या होत्या. तर त्याच त्याच बातम्या पाहून कंटाळा आल्याने तो चंदेरी दुनियाचा कोणता तरी कार्यक्रम. त्यात त्यांनी घातलेले कपडे आणि इतर बरंच काही जे पहायचं असतं, पण त्यावर (आपण) सहसा बोलायचं नसतं (कारण संस्कृती) अस पाहून आला होता.
माझ्या मनात युध्दाचे, तर त्याच्या मनात पाहिलेल्या कार्यक्रमाचे विचार. बाॅॅम्ब कसे पडले याचा विचार मी करत होतो, बातम्यांंमधे दाखवलेल्या त्या धुराळ्यातून मी बाहेर पडलो नव्हतो. तर पाहिलेल्या त्या कार्यक्रमामुळे वेगळ्याच बाॅम्ब वर्षावातून आणि मनात तयार झालेल्या धुराळ्यातून बाहेर पडायच्या मनस्थितीत तो नव्हता. मी अग्निबाणाच्या विचारात, तर तो नयन बाण, आणि मदन बाणांच्या. आणि याच परस्पर विरोधी विचारात या शब्दांनी गोंधळ घातला.
करंट अफेयर काय? अस मी त्याला सहज विचारलं. मग जे विषय निघतील त्यावर तरी गप्पा होतील अस वाटलं.
पण त्यावर तो जे काही बोलला त्यावर मलाच करंट बसला.
कोणाचं करंट अफेयर, काय करायचय आपल्याला, यात खरं खोटं आपल्याला कुठे नक्की माहिती असते. पुुर्वी फक्त सिनेमा, किंवा नाटक यातच हा शब्द ऐकायला मिळत होता. आता सगळ्याच क्षेत्रात अफेअर सुरु असल्याचं बोललं जात. आणि ज्याला आपण करंट म्हणतो ते करंट नसतच. जुनं झाल्यावर आपल्यापर्यंत येतं. आणि त्यावर चर्चा करेपर्यंत एक वेगळं, नवीन (करंट) अफेअर कानावर येतं.
काय त्यांचे कपडे, ते चालणं, तो डान्स. हो तो डान्स असच म्हणाला. नाच म्हणाला असता तर त्या डान्सला कदाचित आदर दिल्यासारख वाटल असत.
आता आम्ही दोघ अफेअर आणि करंट अफेअर यावर गप्पा मारत बसलोय. माझ्या मनातल्या बाणांनी बरंच काही उध्वस्त झालं होतं. तर त्याच्या मनातल्या बाणांनी काही घायाळ झाले असतील. पण बोलतांना आम्ही आमचा बाणा सोडला नाही. माझ्या मनात युध्दामुळे निर्माण होणारी सद्यस्थिती, आणि कलह. तर त्याच्या मनात सद्यस्थितीमुळे निर्माण होणारी काही गृहयुध्द व कलह. युध्दातल्या अग्निबाणांनी काही उंच इमारती जमीन दोस्त झाल्या असतील अस माझं म्हंणण. तर कार्यक्रमातल्या काही गोष्टींमुळे संंस्कृृती जमीन दोस्त व्हायला वेळ लागणार नाही अस त्याच.
युध्दामुळे काही गोष्टींवर नव्याने प्रकाश पडत होता. जे करंट अफेअर मधे होतं. तर त्या झगझगीत प्रकाशा मागच काही प्रमाणात लपवलेलं सत्य त्याच्या (करंट) अफेअर मधून तो सांगायचा प्रयत्न करत होता. माझ्या बोलण्यात युध्दातले स्फोट होते, तर त्याच्या बोलण्यात घटस्फोट. मी आर्थिक हानी बद्दल सांगत होतो. आणि तो सांस्कृतिक हानी बद्दल. अस अफेअर आणि करंट अफेअर यावर गप्पा सुरु होत्या.
महालक्ष्मी विष्णुला म्हणाली, “नाथ, आपण पुरुषोत्तम मासामध्ये दीप प्रज्वलनाची खूप छान माहिती सांगत आहात. आपली वाणी रसाळ आहे त्यामुळे ऐकावेसे वाटते… “
“देवी, तुझी ज्ञानलालसा पाहून मी तुला कथा सांगतो…
सौभाग्य नावाचे एक नगर होते. त्या नगरीचा चित्रबाहू नावाचा राजा होता. तो खूप शूर होता. अत्यंत धार्मिक वृत्तीचा होता. तो कृष्णाची भक्ती करत असे. दानधर्म करणे ही त्याची आवड होती. एकदा अगस्ती ऋषी त्याच्याकडे आले. चित्रबाहूला खूप आनंद झाला. राजाने ऋषी अगस्ती यांचे स्वागत केले. त्यांची पूजा करताना स्तुतीगान केले. राजा म्हणाला, “ऋषीवर, आपण आलात, मी धन्य झालो. मी माझे राज्य आपल्या चरणी अर्पण करतो. “
“राजा, तुझे राज्य मला नको. तुला भेटून मलाही समाधान वाटले… ” ऋषी बोलत असताना राजाची राणी चंद्रकला तिथे आली. तिने ऋषीला नमस्कार केला. चित्रबाहू राजा म्हणाला,
“ऋषीवर, मला कधीकधी असा प्रश्न पडतो की, माझे असे कोणते पुण्याचे काम आहे की, मला राजपद मिळाले. मोठे वैभव प्राप्त झाले. चंद्रकलेसारखी गुणवान पत्नी मिळाली. “
अगस्ती ऋषी काही क्षण डोळे लावून बसले. थोड्या वेळाने डोळे उघडून ते म्हणाले, “मी डोळे लावून बसलो होते तेव्हा मला तुझ्या पूर्व जन्माची हकिकत समजली. चमत्कार नावाचे एक नगर होते. त्या शहरात मणिग्रीव नावाचा एक मानव राहत होता. मणिग्रीव म्हणजे तू! या जन्मात जसा तू सदाचारी आहेस तसा त्या जन्मात नव्हता. तू अत्यंत पापी होता. तुझ्या पत्नीचे नाव सुंदरी होती. सुंदरी म्हणजेच चंद्रकला! पापी पतीसोबत सुंदरी पत्नीधर्म पाळत त्याच्यासोबत राहत होती. मणिग्रीवाच्या वाईट कामाला, त्रासाला त्याच्या गावातील लोक कंटाळले होते. गावकऱ्यांनी मणिग्रीवाला गावातून हाकलून दिले. बृहद्बल त्या राज्याचा राजा होता. त्याने त्याची सारी संपत्ती जप्त केली. त्याला पत्नीसह जंगलात हाकलून दिले.
अरण्यात राहत असलेले मणिग्रीव आणि त्याची पत्नी प्राण्यांची शिकार करून भूक भागवत असत. त्या दोघांना त्या अरण्यात राहताना बराच काळ झाला. एकेदिवशी त्या अरण्यातून एक तपस्वी जात होता. त्याचे नाव उग्रदेव होते. चालताना थकल्यामुळे उग्रदेवाला चक्कर आली. तो जमिनीवर कोसळला. मणिग्रीव आणि त्याच्या पत्नीने त्याला पाहिले. मणिग्रीवाने त्याच्यावर उपचार केले. उग्रदेव शुद्धिवर येताच त्याला मणिग्रीवाने आपल्या घरी आणले. त्याला फलाहार दिला. मणिग्रीवाने त्याची विचारपूस केली.
“मी यात्रेकरू आहे. चालताना माझा रस्ता चुकला. या अरण्यात फिरत असताना खूप श्रम झाल्यामुळे तसेच खूप भूक लागल्यामुळे गरगरल्यासारखे झाले. मी खाली कोसळलो. बेशुद्ध झालो. तुम्ही मला जीवदान दिले. तुम्ही दोघे या अरण्यात का राहता? तुम्ही कोणत्या नगरीचे आहात. मला तुमची काही मदत करता आली तर आनंद होईल. ” उग्रदेवाने म्हणाला. मणिग्रीव त्याची सारी कहाणी उग्रदेवाला ऐकवून म्हणाला,
“मी अनेक दुष्कृते केली आहेत. त्याची शिक्षा म्हणून मी या अरण्यात राहत आहे. माझ्या या साऱ्या प्रवासात माझी पत्नी माझ्यासोबत राहिली. तिची काहीही चूक नसताना तिला अशी शिक्षा भोगावी लागत आहे. सध्या आम्ही फार दुःख भोगत आहोत. यातून बाहेर पडण्याचा नि सुख, शांती, सदाचाराने राहता येईल असा मार्ग मला सांगावा. “
“तू माझी सेवा केलीस. माझा जीव वाचवलास यामागे निश्चितच काहीतरी ईश्वरी संकेत आहे. तुम्हा दोघांचा भाग्योदय मला समोर दिसत आहे. काही दिवसांतच पुरुषोत्तम मास सुरू होत आहे. या महिन्याचे महत्त्व अलौकिक आहे. पुरुषोत्तम मासात भगवान श्रीकृष्णाची मनोभावे पूजा करावी. कृष्णमूर्तीसमोर संपूर्ण महिना नंदादीप लावावा. देवाला नैवेद्य दाखवावा. हे व्रत अत्यंत लाभदायक आहे. हे व्रत केल्याने तुमचा हा अरण्यवास संपुष्टात येईल असा मला विश्वास आहे. ” असे सांगून उग्रदेव पुढील यात्रा करण्यासाठी निघून गेला.
लवकरच पुरुषोत्तम मास आला. मणिग्रीव आणि सुंदरीने उग्रदेवाने सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णाची मनोभावे, यथोचित पूजा केली. त्याचे फळ त्याला मिळाले. मणिग्रीवाच्या स्वभावातील उग्रता नष्ट झाली. मनाला अभूतपूर्व शांती मिळाली. दुष्कर्म करण्याची वृत्ती नाहीशी झाली…
वरील सारा वृत्तांत कथन करून अगस्ती ऋषी म्हणाले, “चित्रबाहू, असा आहे तुझा मागचा जन्म. उग्रदेवाने सांगितल्याप्रमाणे तू पुरुषोत्तम मासामध्ये भगवान श्रीकृष्णाची मनोभावे सेवा करताना संपूर्ण महिना दीप लावला. ते पुण्य गाठीशी होते म्हणून या जन्मात हे सारे वैभव तुला प्राप्त झाले. ” असे सांगून अगस्ती ऋषिंनी चित्रबाहू राजाचा निरोप घेतला…
“नाथ, आपण अत्यंत सोप्या भाषेत चित्रबाहू राजाची कहाणी मला ऐकवली. मला खूप समाधान मिळाले… ” लक्ष्मीदेवी अत्यंत प्रसन्नतेने म्हणाली.
००००
फलदायी मौनव्रत!
श्री लक्ष्मी आणि भगवान विष्णू बोलत असताना लक्ष्मी म्हणाली, “भगवान, आपण सांगितलेल्या कथा ऐकून पुरुषोत्तम मासाबद्दल म्हणजेच त्या मासाच्या कथा ऐकण्याची उत्कट इच्छा होत आहे. एखादी गोष्ट सांगाल का?”
“देवी लक्ष्मी, आपली इच्छा जाणून मी मौनव्रताची माहिती सांगतो… “
“मौनव्रत? म्हणजे चक्क बोलायचेच नाही… “
“होय! तेही संपूर्ण पुरुषोत्तम मास मौन पाळायचे… “
“काय? महिनाभर बोलायचे नाही? कसं शक्य आहे? तेही पृथ्वीवरील मानवाला?”
“का शक्य नाही? भक्ती करणे साधी गोष्ट नाही. कठीण तपस्या केली तर त्याचे फळही तसेच मिळते. “
“देवा, मला मौनव्रताची माहिती द्यावी. “
“देवी, व्रताची माहिती नक्की देईन पण आपण मौनव्रत धारण करू नका… ” असे म्हणत श्रीविष्णू हसले. सोबत लक्ष्मीही हसली.
“ऐका, आता. मौनव्रत म्हणजे पुरुषोत्तम मासामध्ये दररोज एक वेळ जेवण करायचे आणि जेवण होईपर्यंत बोलायचे नाही… “
“देवा, आपण पण असे आहात ना! अहो, महिनाभर मौन ही कल्पनाच अंगावर भीतीचे शहारे आणणारी आहे. फक्त जेवताना बोलायचे नाही हे व्रत त्यामानाने सोपे वाटत असले तरीही ते तितके सोपे नाही. भगवान, मला सांगा, हे व्रत कुणी केले आहे का?”
“हे व्रत मुनीवरांनी केले आहे. “
“काय? देवर्षी नारदांनी हे व्रत केले आहे? कधी, का, कशासाठी?”
“सांगतो. पूर्वीच्या जन्मात नारद मुनी दासी पुत्र होते. पुरुषोत्तम मासात हे मौनव्रत धारण केल्याने पुण्य मिळते म्हणून त्या दासी पुत्राने ते व्रत मनोभावे केले. हे व्रत केल्याने त्याला साधुंचा सहवास लाभला. साधुंच्या सोबत कुरुक्षेत्र येथे त्याने अधिक मासाचे औचित्य साधून तीन दिवस मौनव्रत पाळले. त्यामुळे ब्रह्मदेव प्रसन्न झाले. त्यांनी नारदाला अनेक विद्यांची शिकवण दिली. आपल्या शिष्याला त्यांनी मानसपुत्र मानले. असा आहे मौनव्रताचा महिमा तोही अधिकमासातील!”
“महाविष्णू, मुनीवराची ही माहिती मला नव्हती. आपण ती सांगितली. मी धन्य झाले. “
“लक्ष्मीदेवी, प्रत्यक्ष इंद्रदेवाला या व्रताचा फायदा झाला हे तुला माहीत आहे का?”
“काय सांगता? इंद्रदेवाने मौनव्रत पाळले पण का? अशी कोणती वेळ इंद्रावर आली की, त्यांनी मौनव्रत धारण केले. “
“सांगतो ऐक. पूर्वी अवंतीनगरात एक ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव वेदशर्मा! तो अत्यंत ज्ञानी, योगी होता. वेदशर्मा वृद्ध झाला असताना अधिकमास आला. तेव्हा वेदशर्माने उपवास करण्याचा विचार केला. परंतु तो शरीराने थकला होता. इच्छा प्रबळ होती परंतु शरीर साथ देईल का नाही ही शंका होती. तो विचारात असताना चमत्कार घडला. एका रात्री त्याला स्वप्न पडले. स्वप्नात एक दिव्य पुरूष अर्थात देव आले. ते म्हणाले, “वेदशर्मा, तू तुझ्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर उपवासाचे व्रत निश्चितच करू शकशील. तू मौनव्रत अवश्य कर. “
ते स्वप्न म्हणजे ईश्वरी संकेत मानून वेदशर्माने मौनव्रत धारण केले. ईश्वरी शक्ती पाठीशी असल्याने त्याने ते व्रत पूर्णत्वास नेले. त्याच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या श्रीकृष्णाने त्याला दर्शन दिले. त्याला आशीर्वाद देताना वरदानही दिले. त्यामुळे वेदशर्माने परोपकाराची अनेक कामे केली. त्याचे भाग्य फळाला आले. त्याला श्रीविष्णुने विमान पाठवून वैकुंठात नेले. वैकुंठात जात असताना प्रत्यक्ष इंद्राने त्याला थांबवले. इंद्र म्हणाला, “वेदशर्मा, तू पुण्यवान आहेस. सध्या माझे वृत्रासुरासोबत युद्ध सुरू आहे. तू पुरुषोत्तम मासामध्ये मौनव्रत पाळले होते. तुला त्याचे फळ मिळाले. माझी अशी इच्छा आहे की, तुला जे फळ प्राप्त झाले आहे, त्यापैकी फक्त एका दिवसाचे पुण्य मला द्यावे. त्यामुळे मी वृत्रासुरासोबतचे युद्ध खातरीने जिंकू शकेल. ” इंद्राची इच्छा परोपकारी वृत्ती असलेल्या वेदशर्माने तत्काळ पूर्ण केली. तो वैकुंठात निघून गेला. इंद्रदेवाने वेदशर्माकडून प्राप्त झालेल्या फळामुळे वृत्रासुराचा युद्धात पराभव केला…
“देवी लक्ष्मी, असा आहे, अधिक मासातील मौनव्रताचा फायदा किंवा फळ!”
“भगवान, खरे आहे. मौनव्रत हे तसे कठीण वाटत असले तरीही त्याचे फळ मात्र अलौकिक आहे. ” लक्ष्मी म्हणाली.
००००
अधिक मासातील पर्वकाळ!
भगवान विष्णू आणि महालक्ष्मी यांच्या संवादातून भक्तांना अधिक मासासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती मिळत होती. लक्ष्मीने विचारले, “माधवा, मला एका गोष्टीची उत्सुकता लागली आहे. ती म्हणजे, अधिक मासात कोणते पर्वकाळ येतात? त्याची वैशिष्ट्ये नि त्यापासून भक्तांना होणारे लाभ याबाबत माहिती सांगावी. “
“अवश्य! देवी, मला माहिती आहे, हे प्रश्न तू स्वतःसाठी नव्हेतर भक्तांच्या ज्ञानासाठी, उत्कर्षासाठी विचारत आहेस. पुरुषोत्तम मासात व्यतिपात, पोर्णिमा, वैधृती, द्वादशी तसेच अमावस्या हे पाच पर्व येतात. व्यतिपात या पर्व काळात उपासनेमुळे यमधर्म समाधानी होतो. व्यतिपाताच्या दिवशी सुवर्ण दानाचे महत्त्व आहे, तप करून आणि तेरा फळे दान केल्यास पुण्यफळ मिळते. जे भक्त पोर्णिमेच्या दिवशी धार्मिक विधी करतात तेव्हा प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचा आशीर्वाद मिळतो. ज्या दिवशी वैधृती असते त्यादिवशी स्नान, होमहवन आणि दान करतो त्या भक्ताला इच्छित ते सारे मिळते. पुरुषोत्तम मासातील द्वादशीचा योग साधून खुद्द पुरुषोत्तम प्रसन्न होतो. अमावस्या हे अधिक मासातील शेवटचे पर्व! यादिवशी आपल्या पितरांचे स्मरण करून यथाविधी, यथाशक्ती दानधर्म, अन्नदान केल्यास आपले पूर्वज आनंदी होतात. “
“हरीहर, पाच पर्वांची माहिती नि चार पर्वांचे महत्त्व खूप छान, सोप्या भाषेत सांगितले. त्रिविक्रमा, आता द्वादशी ह्या पर्वाचेही महत्त्व सांगावे. “
“रमादेवी, आपण किती एकरुप होऊन ऐकत आहात हे या प्रश्नावरून लक्षात येते. आपली जिज्ञासू वृत्ती खरेच वाखाणण्याजोगी आहे. ऐक. अधिक मासातील एकादशीला उपवास करावा. द्वादशीचे महत्त्व अपरंपार आहे. कुण्या भक्ताला अनेक तीर्थयात्रांचे पुण्य घरबसल्या मिळवायचे असेल तर त्याने आवळीच्या झाडाजवळ जावे. त्या झाडाच्या बुंध्याशी (अर्थात जे झाड नैसर्गिकरित्या नष्ट झालेले असते. परंतु जमिनीवर खोडाचा भाग शिल्लक राहतो) केलेले पिंडदान थेट आपल्या पूर्वजांना मिळते. तसेच ब्राह्मणाला अन्नदान करावे. शक्य असेल त्याने पुढील दाने अवश्य करावीत ती म्हणजे भूमीदान, वस्रदान, गोमाता दान करावे. तुप मिसळून केलेले अन्नदान करावे. हे दान खूप फलदायी आहे. विष्णुप्रिये,
तुझी ज्ञानलालसा पाहून तुला दानाची अधिक माहिती देतो. व्यतिपात, द्वादशी आणि पोर्णिमा या तीनही दिवशी किंवा कोणत्याही एकादिवशी तुपामध्ये तेहतीस अनारसे तळावेत. त्यावर स्वच्छ कापड झाकावे. त्याची पूजा करावी. भोजन दक्षिणेसह ते ब्राम्हणास दान करावे. म्हणजे भरपूर पुण्य मिळते. असा आहे अधिक मासातील पर्वकाळाचा महिमा!”
” हे पद्मनाभा, खरेच अधिक मासातील पर्वकाळाची माहिती आपण खूप छान सांगितली आहे. श्रीहरी!”
००००
पुरुषोत्तम मास: स्नान महात्म्य!
पुरुषोत्तम मासाच्या कथा तन्मयतेने ऐकणाऱ्या लक्ष्मीदेवीने पतीला विचारले, “हृषिकेशा, आपण अधिक मासाची भरपूर माहिती दिली आहे. आता फक्त एकच सांगावे, या मासात स्नानाचे काही महत्त्व आहे का?”
“देवी, अगदी योग्य विचारलेस, त्यासंदर्भातील तुला एक कथा सांगतो. त्या कथेतून तुला स्नानाचे महत्त्व समजून येईल. ऐक. शिवपुरी नावाचे एक नगर होते. हे नगर शंकराला अतिशय प्रिय होते. गोकर्ण पर्वताच्या सान्निध्यात हे नगर वसलेले होते. नगरातील लोक अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते. पूजा, भजन, वेदमंत्र, प्रवचन, कीर्तन यात रमणारे नागरिक सतत धर्मकार्ये करत. अशा या पावन भूमीत विप्रदास नावाचा मनुष्य राहत होता. सोबत त्याची पत्नी होती. दोघेही सत्शील, धर्मपरायण होते. धार्मिक विधी ते आवडीने करत. गोकर्णाच्या पायथ्याशी गोकर्णी नावाची नदी होती. तिथेच एक शिवलिंग होते. सारणेश्वर या नावाने ते शिवलिंग प्रसिद्ध होते. गोकर्णी नदीत स्नानाचे अपरंपार महत्त्व होते. अधिक मासाचे औचित्य साधून विप्रदासाने त्याच्या पत्नीसह संपूर्ण महिना नदीत स्नान केले. महिन्याच्या शेवटी केलेल्या कार्याचे उद्यापन केले. ब्राह्मणांना भोजन-दक्षिणा देऊन दोघेही मोठ्या आनंदाने घरी निघाले. थोडे चालून जाताच शेकडो प्रेतात्मे अचानक त्यांच्यासमोर आले. दिसताक्षणी कुणीही घाबरेल असेच त्यांचे राहणीमान होते. परंतु विप्रदास घाबरला नाही. तो निर्भीडपणे त्या प्रेतात्म्यांच्या समोर उभा राहिला. त्या प्रेतात्म्यांनीही विप्रदासाकडे पाहिले. त्याचा परिणाम असा झाला की, त्या प्रेतात्म्यांची क्रुरशक्ती नष्ट झाली. अनेक प्रेतात्मे शांत झाले परंतु बरेचसे प्रेतात्मे क्रुर दिसत होते. त्यांच्याकडे पाहताच विप्रदासाची पत्नी खूप घाबरली. ती दूर जाऊन लपली. विप्रदासाने प्रेतात्म्यांना विचारले,
“आपल्या सर्वांची अशी दुर्गती का झाली?” त्यावर अनेकांनी त्यांनी पूर्वजन्मात केलेल्या पापांची माहिती दिली. त्यांची कहाणी ऐकून विप्रदास त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटली. त्याने अधिक मासात गोकर्णी नदीत केलेल्या स्नानापैकी सात दिवसांच्या स्नानाचे पुण्य त्या प्रेतात्म्यांना दिले. तत्काळ चमत्कार घडला. त्या सर्व प्रेतात्म्यांना पूर्वीचे शरीर प्राप्त झाले. ते स्वर्गात गमन करते झाले. ” असे सांगून भगवान विष्णू थांबले. लक्ष्मीदेवी म्हणाली,
“हे संकर्षणा, पुरुषोत्तमा, आपण पुरुषोत्तम मासाची सर्वंकष महत्त्व खूप उत्कृष्टपणे सांगितले आहे. आपण सांगितलेला महिमा ऐकून भक्तगण मोठ्या भक्तिभावाने अधिक मासाचे व्रत, पूजा करतील हे नक्की!