मराठी साहित्य – विविधा ☆ चैत्र… ☆ डाॅ.व्यंकटेश जंबगी ☆

डाॅ. व्यंकटेश जंबगी

?  विविधा ?

☆ चैत्र… ☆ डाॅ.व्यंकटेश जंबगी ☆

वसंत, किती वसंत येऊन गेले जीवनात रमून जातो आपण आठवणीत किती सांगू माझ्या वसंताचे ऋण फुलवितो जीवन मोगर्यासमान आठवती बालपणीची गाणी….

“सुखावतो मधुमास हा…”

“आला वसंत येथे मज ठाऊकेच नाही…”

“आला वसंत ऋतू आला….”

“कुहू कुहू बोले कोयलिया….”

“कोयलिया बोले अंबुवा डालपर ऋतू बसंतकी देत संदेसवा..”

वसंत, कोकिळ,आम्र आणि उन्हाळ्याची सुट्टी यांचं नातं आंब्यासारखं…आभ्यासाच्या साली काढून सुट्टीच्या गराचा आस्वाद घ्यायचा.. नव्या वर्गात जाण्यासाठी कोय पेरायची….

आठवतात का…..

काचाकवड्या,कैरम,गोट्या,पत्ते पोहणे.. सायकलवर काम फत्ते.

आमच्या चकार्या ज्येष्ठांच्या चकाट्या..पिट पिट पिटायच्या.

आठवतात का ते दिवस….

मामा,काका, मावशी, आत्या त्येकाची मुलं पाच…

भल्या मोठ्या मामाच्या वाड्यात फक्त धुडगूस आणि नाच….

आठवतात का, गाण्याच्या भेंड्या  सारे आजोबा उडवायचे शेंड्या..

आठवतात का फणस, त्याच्या भाजलेल्या बीया, चुलीत हात घालून बाहेर सुखरूप काढणार्या आजीची किमया.

आठवतात का, मोठे झालो.. किती वसंत जीवनात आले ? 

वसंतराव देशपांडे,वसंत देसाई, एकाचे गाणे एकाची सनई वपुतल्या वसंताने किमया केल्या आजी स्टाईलने कथा सांगितल्या.

वसंत बापटांच्या कविता अजून रेंगाळतात मनाच्या कोपऱ्यातून चांदोबा चंपक साथ सोडून गेले मोबाईलची “साथ” लावून गेले.

सगळे “वसंत” वाचनालयी राहिले गुपचुप कपाटात नंबराने थांबले.

आजी झाली कार्टून,काका झाले यूट्यूब, आजोबा झाले गुगल मामा आत्याची दांडी गुल.

असाच परवा  “वसंत” भेटला.

“ओळखलस का ?” म्हणाला.

मी बालपणात घेऊन गेलो त्याला गळ्यात पडून ढसढसा रडला.  मी म्हणालो “झालं काय?”

म्हणतो,”अजून शिशीरच आहे रे.

मामाचा वाडा ओस आहे.

आंब्याचे झाड उदास आहे.

कैर्यांच्या फोडी भेळेत खातात, माझ्या कैर्या तशाच राहतात.

आता मी “वसंत”नाही “समर”

आहे, फक्त पंचांगापुरता अमर आहे.कोकिळ गात नाही आता फक्त रडतो आहे,पंचम आता वाद्यांच्या गोंगाटात लुप्त आहे.”

माझेही डोळे पाणावले,म्हणालो “वसंता,जरा धीर धर.तुझ्याही जीवनात “वसंत”येईल..!”

“खरच?”डोळे पुसत वसंत म्हणाला..मी म्हणालो,”हां,हां शिशीर आया है,तो वसंतके आनेमें देर कहां?”

वसंत तोच आहे,सृष्टी बदलत नाही,माणसाची द्रुष्टी बदलते त्याला इलाज नाही!

© डॉ. व्यंकटेश जंबगी

एफ-३, कौशल अपार्टमेंट, श्रीरामनगर, ५ वी गल्ली, सांगली – ४१६ ४१४
मो ९९७५६००८८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संकल्पाचा दिवस… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

संकल्पाचा दिवस☆ सौ कल्याणी केळकर बापट

खरंतरं नववर्षाच्या दिवसाचे वेध हे दोनतीन दिवसा आधीपासूनच लागतात आणि त्याची साग्रसंगीत तयारी सुद्धा करावी लागते.कारण  हा  दिवसच मुळी खूप महत्वाचा, आनंदाचा आणि मांगल्याचा.

चैत्र शुद्ध प्रतिपदा.गुढीपाडवा. हिंदू नववर्षाची सुरवात. वर्षाचा  पहिलाच दिवस. येते वर्ष आपणा सगळ्यांना निरामय आरोग्याचे, सुखाचे आणि भरभराटीचे जावो हीच श्रीराम चरणी प्रार्थना.

आमच्याकडे खेड्यावर श्रीरामाचं नवरात्र असतं.गावी बापटांचं श्रीराममंदिर आहे.ह्या दिवशी सकाळपासूनच मंगलमय,प्रसन्न असं वातावरण असतं.अगदी भल्या पहाटे पाच वाजता रांगोळ्या रेखाटून, तोरणं लावून गुढीचे स्वागत करायला सगळा गाव सज्ज होतो.गुढी उभारणीचा मुहूर्त अगदी सुर्योदयाचा.गुढीला ल्यायला काठापदराचे नवीन वस्त्र, हार,बत्तासे गाठ्या,कडुलिंबाच्या डहाळ्या,आंब्याची पाने इ. नी गुढी सजवायची.त्यावर कलश पालथा घालून गुढी सजवून ती उंच उभारायची.

गुढी म्हणजे सौख्याचे,मांगल्याचे प्रतीक. खरचं असे सणवार आपण साग्रसंगीत घरी केलेत तरच हा वसा पुढील पिढीपर्यंत पोहोचेल.

आजकाल बहुतांश गावांमध्ये होणारा एक दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम” पाडवापहाट “बघण्यास जाण्याचा योग ह्या घरच्या पुजेमुळे येत नाही. कारण सगळ्यात जास्त आपल्या घरची गुढी उभारणं, तिचं व्यवस्थित पूजन करुन नैवेद्य दाखविणं. आणि हा चांगला वसा जर पुढील पिढीपर्यंत संक्रमित करायचा असेल तर आधी तो आपण जपून दाखविला पाहिजे.

मागे दोन वर्षांपासून कोरोनामुळे सगळे सामुहिक धार्मिक कार्यक्रम, एकत्रितपणे साजरे केल्या जाणारे सणसमारंभ ह्यावर जरा अंकुशच आला होता. आता जरा मोकळं झाल्यासारखं वाटतं.

आता गुढीपाडवा ,नववर्षाचा पहिला दिवस,निदान ह्या दिवसाची सुरवात अगदी स्वतःबद्दलची एकतरी खरीखुरी गोष्ट सांगुन करावी ह्या उद्देशाने सांगते गुढीपाडवा हा माझ्यासाठी  आणखी एका कारणासाठी खूप महत्त्वाचा दिवस. असे कित्येक गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मी काही तरी स्वतःमध्ये चांगले बदल,स्वतःला चांगल्या सवयी लावून करते पण खरी गोम अशी की हे संकल्प रामनवमी पर्यंत सुरळीत बिनबोभाट कटाक्षाने नियमित सुरू राहतात आणि मग एकदा का रामनवमी झाली की परत ये रे माझ्या मागल्या नुसार माझी संकल्पांची एस. टी. गचके खात थांबते.पण एक नक्की दर गुढीपाडव्याला संकल्प ठरवायचा आणि तो काही दिवस सुरू ठेवायचा हा शिरस्ता काही माझ्याकडून कधीच मोडला जात नाही हे पण खरे.

पोस्टची ची सांगता माझ्याच एका जुन्या रचनेने पुढीलप्रमाणे

*

वसंतऋतूच्या आगमनाने तरवरतोय,

अवनीवरील कण न कण,

त्यानेच प्रफुल्लित झाले मन,

कारण हिंदू वर्षातील आज पहिलाच सण ।।

*

गुढीपाडवा म्हणजे अनुपम सोहळा,

सुरू होतयं आनंदाचं  सत्र,

कारण ह्याच दिवसापासून सुरू होतयं,

आमच्या रामराजाच़ नवरात्र, ।।

*

आमच्या ह्या सणाचा आनंद

काही औरच आणि निराळा,

सुर्योदयावेळी गुढी उभारणे ,

हा एक अनुपम सोहळा  ।।    

*

रावणाविरुध्ज विजयश्री मिळविली रामाने

धरुन सत्याचे शस्त्र,

मांगल्याची गुढी सजली,

लेवून कोरे करकरीत वस्त्र,

गुढीचे सौंदर्य खुलते गाठीबत्तासे व

कडूलिंबाच्या तोरणाने,

निरामय आरोग्याची सुरवात होते.

ह्या सगळ्याच्या सेवनाने ।।।

*

गुढीपाडव्याचा कलश असतो,

प्रतीक मांगल्याचे,

ह्या सणाच्या आगमनाने

लाभतात क्षण सौख्याचे,

असा हा सण न्यारा गुढीपाडवा,

रामनामातच एकवटलाय सारा गोडवा ।।

*

चैत्रशुद्धप्रतिपदेच्या म्हणजेच  

गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा ।।।

नवीन वर्ष आनंदाचे,सौख्याचे, निरामय आरोग्याचे,भरभराटीचे जावो हीच रामराया जवळ प्रार्थना.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ इंद्रधनुष्य – गमती जमती ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

इंद्रधनुष्य – गमती जमती ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

पाऊस पडून गेला कि सगळी सृष्टी आनंदी होते. धरती हिरवीगार होते, रंगीबेरंगी फुलं माळते. रंग आणि गंध यांची मुक्त उधळण करते. रंगीबेरंगी फुलापाखरं फुलांवर रुंजी घालतात.पक्षी, गाणी गात स्वछंद विहार करतात. या सगळ्या आनंदात आकाश कां मागे राहील. त्याला तर ढगांच्या जोखडातून मुक्त झाल्याचा केवढा आनंद होतो, मग तो ही इंद्रधनुची सप्तरंगी कमान उभी करतो. हे सारं पहायला मिळणार म्हणून तर आपण आज हा सूर्याचा दाह मुकाट सहन करतोय. होय नां!

आज अर्थात आपला पाऊस हा विषय नाही. आज इंद्रधनुष्य, ही जी निसर्गाची किमया आहे त्याबद्दलच्या काही गमती पहायच्या आहेत. खरं म्हणजे ह्या गमती निर्माण करण्यात निसर्गाचा जेवढा वाटा आहे तेवढाच आपल्या ज्ञान – चक्षुंचा आहे. म्हणजे डोळ्यांना काय पहायचं, कसं पहायचं, ह्याचं ज्ञान देणारा  मेंदूचा भाग. जसं  आकाश नावाची वस्तू कुणी वर अंथरलेली नाही, की त्याला कुणी निळा रंग दिलेला नाही. तसंच इंद्रधनुष्य म्हणजे कुणी कमान उभी केलेली नाही कि रंगाचे पट्टे मारलेले नाहीत. हे सगळे आपल्या डोळ्यांनी निर्माण केलेले आभास आहेत. आणि ते खरे मानून आपण त्यात रमतो. म्हणजे कल्पनेत रमण्याची मक्तेदारी कांही फक्त कवींची नाही, आपली पण आहे.

त्या सप्तरंगी कमानीला इंद्रधनुष्य म्हणतात कारण ती कमान धनुष्याच्या आकाराची आहे. त्या कमानीवरून मधल्या उंच टोकावर गेलं कि स्वर्गाचं दार दिसतं. आपल्या नशीबानं जर ते उघडलं तर इंद्राचा दरबार दिसतो, म्हणून इंद्राकडे म्हणजेच स्वर्गाकडे जायचा मार्ग सोपा करणारं म्हणून इंदधनुष्य ! फक्त आपल्या कडंच नाही हं, सगळ्या देशात अशा इंद्रधनुष्याशी संबधित गमतीदार कथा आहेत.

पुढच्या गमती पहाण्यासाठी अगदी प्राथमिक शास्त्रीय माहिती घेऊया. पाऊस पडून गेल्यावर हवेत असणाऱ्या पाण्याच्या थेंबातून जर 42 अंशाचा कोन करून प्रकाश किरण गेला तर त्या किरणाचे थेंबात जाताना व बाहेर पडताना असे दोनदा अपवर्तन होते. किरणाची दिशा बदलते व त्याचे सात रंगात पृथ:करण होते. ही क्रिया एकाच वेळी करोडो थेंबात होते कारण तेथे प्रकाश किरण सुद्धा करोडो असतात.थेंब गोल आकाराचे असल्यामुळे गोल आकाराचा रंगीत पट्टा म्हणजे गोल इंद्रधनुष्य तयार होते. खरं तर त्या पट्यात लाखो रंग असतात, पण आपले डोळे प्रमुख सात रंगच पाहू शकतात. चीनी लोक तर पाचच रंग असतात असे अजून मानतात. क्षितिजामुळे आपल्याला फक्त वरचा अर्धा भाग दिसतो. उंचावरून किंवा विमानातून पाहिल्यास गोल इंद्रधनुष्य दिसू शकते. समुद्रावर इंद्रधनुष्य पडले असेल तर तिथे अर्ध्यापेक्षा थोड़े जास्त दिसते. किरणांचा 42 अंशाचा कोन तयार होण्यासाठी किरण तिरपे यावे लागतात, त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी इंद्रधनुष्य दिसते व ते ज्या क्षितिजावर सूर्य असेल त्याच्या विरुद्ध क्षितिजावर दिसते.

अशाप्रकारे तयार होणाऱ्या इंद्रधनुष्याला प्राथमिक इंद्रधनुष्य म्हणतात. याचा बाहेरचा रंग लाल तर आतला रंग जांभळा असतो. जर प्रकाश किरणाचे थेंबाच्या आत दोनदा, तीनदा, अनेकदा परावर्तन व अपवर्तन झाले तर एकावर एक अशी दोन, तीन, अनेक इंद्रधनुष्ये तयार होतात, त्यांना दुय्यम इंद्रधनुष्ये म्हणतात. फक्त वरच्याचा रंगक्रम खालच्या च्या उलट असतो, म्हणजे दुसरं जे तयार होतं त्याचा बाहेरचा जांभळा व आतला रंग लाल असतो. दुय्यम इंद्रधनुष्ये फारशी दिसत नाहीत कारण प्रकाश किरणाचे वारंवार परावर्तन झाल्यामुळे किरणाची तीव्रता कमी होते. त्यामुळे इंद्रधनुष्ये इतकी फिकट होत जातात की डोळ्यांना दिसू शकत नाहीत. शास्त्रज्ञांनी प्रयोग शाळेत एकाचवेळी दोनशे इंद्रधनुष्ये तयार करण्यात यश मिळवले आहे.

इंद्रधनुष्य तयार होण्यासाठी पावसाचेच थेंब लागतात असे नाही, दव, धुके, पाण्याचा फवारा, धबधबा अशा ठिकाणी ही इंद्रधनुष्य तयार होते. धबधब्याच्या ठिकाणी पूर्ण गोल इंद्रधनुष्य दिसू शकते. ब्राझील व अर्जेंटिना यांच्या सीमेवरील इग्वाझू व पराना या दोन नद्यांच्या

संगमातून 240 पेक्षा जास्त धबधबे तयार झाले आहेत. मीना प्रभू यांच्या ‘दक्षिण रंग’ मधे त्यांनी इथल्या गोलाकार इंद्रधनुष्यांचे  फार सुंदर वर्णन केले आहे. बर्फाच्या कणातून सुद्धा असा रंगीत पट्टा तयार होतो, फक्त त्याचा आकार, रंग वेगळे असतात. त्याला Fire bow म्हणतात.

अशाच प्रकारे चंद्राच्या प्रकाश किरणापासून सुद्धा इंद्रधनुष्य तयार होऊ शकते . फक्त प्रकाशकिरण तेवढे तीव्र असायला हवेत. जगाच्या कांही भागात हे moon bow दिसते.

आता अशी एक गोष्ट सांगणार आहे कि ती तर तुम्हाला खरीच वाटणार नाही. प्रत्येकाला दिसणारं त्याचं त्याचं इंद्रधनुष्य वेगळं असतं. कारण प्रत्येकाचे क्षितिज वेगवेगळे असते . कवी कल्पना वाटती आहे नं! सूर्याकडे आपली पाठ असते. समोर इंद्रधनुष्य असतं. बघणाऱ्याच्या डोक्यावरून, डोक्याच्या सावलीच्या दिशेने 42 अंशाचा कोन करणारे प्रकाश किरण पाण्याच्या थेंबात प्रवेश करतात. तेवढया जागेत सुद्धा अनंत थेंब व अनंत प्रकाशकिरण असतात. त्याच किरणांचे  पृथःकरण होऊन रंगीत इंदधनुष्य बघणाऱ्याच्या डोळ्यासमोर तयार होते. दुसऱ्या माणसा समोर दुसरे किरण व दुसरे थेंब असणार म्हणजे त्याला दिसणारे इंदधनुष्य पण वेगळे असणार. तसेच बघणाऱ्याच्या डोळ्यात शिरणारे साती रंगांचे किरण एकाच थेंबात तयार झालेले येत नाहीत. वेगवेगळया अपवर्तनाच्या कोनामुळे वेगवेगळ्या थेंबातून वेगवेगळ्या रंगाचे किरण येऊन आपले इंद्रधनुष्य बनते. त्याहून पुढची गंमत, जर हे इंद्रधनुष्य गोल असेल तर त्याच्या मध्यभागी

बघणाऱ्याच्या चेहऱ्याचे प्रतिबिंब ही दिसते. म्हणून असं इंद्रधनुष्य दिसणे आपण भाग्याचे मानतो. अशा गोल इंद्रधनुष्याला इंद्रवज्र म्हणतात.

जरी शास्त्रीय खुलासे कळायला अवघड वाटले तरी होणारे परिणाम वाचून गंमत वाटली असेल नं!आपले डोळे सुद्धा काय काय भास निर्माण करतात!!

ही साठा उत्तराची कहाणी पाचाऊत्तरी सुफळ संपूर्ण!!!

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नाती अपडेट व्हायला हवीत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? विविधा ?

☆ नाती अपडेट व्हायला हवीत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

नेहमीप्रमाणे आठवड्यातून मी घरी जात असतो तसाच कालही गेलो. घरी आलो की सगळी दुनिया विसरून मी माझ्या दोन वाघांशी म्हणजे माझ्या निर्भय आणि शार्दुल सोबत मस्त रमून जातो. गेल्या गेल्या असाच रमून गेलो. बायकोने चहा दिला. चहा घेत असताना आमची दिदी आली, दिदी म्हणजे माझ्या मोठ्या भावाची मुलगी. तसा तो चुलत भाऊ पण मला सख्खा भाऊ नसल्यामुळे माझी सगळी चुलत भावंडे मी सख्ख्यासारखी ठेवली आहेत. भावांची बहिणींची सगळी लेकरं मला तात्या म्हणूनच बोलतात.

दिदी तसच मला पाहून जोरात आनंदाने ओरडली.”अय्या तात्या कधी आलायस, बरा आहेस का? असं म्हणत जवळ येऊन बसली आणि म्हणली, ”तात्या अरे पुढच्या महिन्यात लग्नाची तारीख काढायची म्हणतायत पप्पा. ”मी या दोन वाघांना मिठीत घेऊन रमून गेलो होतो तिच्या या वाक्याने मी थोडासा गडबडलो. मी म्हणलं दिदी कुणाचं गं लग्न? दिदीने सांगितलं तिचंच लग्न म्हणून आणि फलटण चे पाहुणे आहेत. सगळं ठरवून झालं आहे तात्या फक्त तारीख काढायची बाकी आहे. आणि तू हवा आहेस इथं, सुट्टी घे. बाकीचे कोणते कार्यक्रम घेऊ नकोस. दिदी हे बोलत होती आणि मी आतून  घायाळ होत चाललो होतो. कारण यातलं एक टक्कासुद्धा माझ्या कानावर आलेलं नव्हतं. मी बायकोला जोरात आवाज देऊन बाहेर बोलावलं आणि रागाने विचारलं, की घरातली एवढी महत्वाची गोष्ट तू मला का सांगितली नाहीस. तर तिलाही यातलं काही माहीत नव्हतं. मला प्रचंड आतून वेदना होत होत्या. मी यांचा कुणीच नाहीय का? म्हणून आतून हुंदकत होतो. त्याच तंद्रीत पायात चप्पल घातली आणि थेट त्याच्या घरी. जेमतेम दहा मिनिटांचं पावली अंतर आमच्या दोन घरांमध्ये.

आमचं गाव असल्यामुळे घराची दारे बंद नसतात, की दारावर बेल वैगेरे नसते. थेट घरात घुसलो तर हा मोठा भाऊ आमचा नुकताच जेवायला बसला होता. मी कसलाही विचार न करता त्याला एवढंच म्हणलं. ”का रे दादा आपल्या दीदीला पाहुणे येऊन पसंत करून गेले. सगळी बोलणीसुद्धा झाली. फक्त तारीख काढायची राहिलीय आणि यातलं आम्हाला कुणालाच माहीत नाही असं का.? तर मला म्हणाला,”तुम्हाला कुणाला आमची काळजी आहे का.? तुम्हाला कुणाला आमचं चांगलं झाल्याचं बघवतच नाही. त्याच्या या बोलण्याने मी कोसळून गेलो. ”मी म्हणलं अरे आम्हाला कळलं तर आम्ही येणार ना. तर तो रागाने एकटक माझ्याकडे पाहत म्हणाला, नितीनराव आठ दिवसांपूर्वी मी तुला व्हाट्सअप्प ला मॅसेज करून ठेवलाय की दिदीला फलटणचे पाहुणे बघायला येणार आहेत म्हणून आणि तू अजूनही तो मॅसेज साधा वाचला सुद्धा नाहींयस. मी रोज पाहतोय तू ऑनलाईन असतोस पण माझा मॅसेज तू वाचत नाहींयस.

तातडीने मी माझा मोबाईल खिशातून बाहेर काढला, प्रिय दादा म्हणून त्याच्यासमोर नाव सर्च केलं आणि व्हाट्सअप्प ला पाहिलं तर खरोखर त्याने मला आठ दिवसापूर्वी तसा मॅसेज पाठवला होता. मी त्याच्याकडे नजर उचलून पाहिलं. तर, आता तुझ्यात आणि माझ्यात कसलेच नाते उरले नाही असा काही त्याच्या चेहऱ्यावरचा अनोळखी भाव पाहून मला त्याची अक्षरशः किव आली.

मग मी बोलायला सुरवता केली, की, ”दादा कामाच्या घाईत व्हाट्सअप्प वर येणारे प्रत्येक मॅसेज प्रत्येकजण आवर्जून वाचतोच असे नाही. मोबाईल काय माझ्या शरीराचा अवयव नाहीय दादा. त्यावर काही आलं की लगेच माझ्या मेंदूशी कनेक्ट होत नसते. आपलं घर लांब नव्हतं. तुझ्या बायकोने येऊन सांगायला हवं होतं किंवा साधा एखादा फोन तरी करायचा ना निदान, तुझा आवाज कानातून मेंदूत तरी गेला असता. तू व्हाट्सअप्प वरून मला कळवलं म्हणजे तू तुझं नात्यातील कर्तव्य पार पाडलं असं वाटलं का तुला? आणि तो माझ्याकडून मॅसेज वाचायचं राहून गेलं म्हणून तू इतक्या टोकाचे बोलतोय की बस्स आपल्यात आता काहीच नातं नाही राहिलं. मग तस असेल तर आम्हीही व्हाट्सअप वरूनच अक्षता पाठवतो, त्या दिवशी हवं तर दिदीचा फोटो dp ला ठेवतो. तू तिकडून आम्हाला जेवणाचं ताट पाठव चालेल ना दादा हे, ’यावर जरा तो गार पडला. मी प्रचंड अस्वस्थ होतो. ”माझ्या भावाच्या मुलीच्या लग्नात वरातीत मित्रांना घेऊन तंगड्या वर करून नाचायचं स्वप्न पाहणारा मी. नसेल माझी परिस्थिती सध्या तुझं ओझं उचलण्याची पण कुठूनतरी हप्त्यावर का होईना निदान एक गोदरेजचं कपाट तरी मी घेतलंच असतं की रे माझ्या दीदीसाठी. लग्नाच्या मांडवात पंगतीला भात वाढण्याची स्वप्न पाहणारा हा तुझा भाऊ केवळ तुझा व्हाट्सअप्प चा मॅसेज मी वाचला नाही म्हणून तुला इतका परका वाटायला लागला का रे? हे व्हाट्सअप्प इतकं महत्वाचं झालं का? “ हे व्हाट्सअप कधी आलं? तुझा माझा संवाद साधण्यासाठी आपल्याला याची गरज पडावी? ”एखादी साधी गोष्ट असती तर मी समजून घेतलं असतं पण, आयुष्यातली इतकी महत्वाची गोष्ट तू समोरासमोर माझ्याशी न बोलता या माध्यमातून सांगू पाहत होतास.?

दादा वयाने मोठा आहे. माझ्या बोलण्यावर तो मान खाली घालून उभा होता. त्याची चूक त्याला कळली होती. पण खरंतर तो चुकीचा नव्हताच. तो डिजिटल होता होता इतका गुंतून गेला की नातीसुद्धा त्यावरच टिकवू पाहायला लागला. दोघांच्याही डोळ्यात गच्च पाणी भरून आलं होतं. तसाच त्याला जोरात आवळून मिठीत घेतला. मिठीत येत फक्त एवढंच म्हणाला, नितीन सॉरी भावा, चुकलं, आज कळलं आयुष्यात की तू कवी का आहेस ते.

घट्ट झालेली मिठी मी डोळे पुसत पुसत सैल केली. हातात मोबाईल घेतला. नेट सुरू केलं. व्हाट्सअप्प उघडलं आणि नाव पुन्हा सर्च केलं प्रिय दादा. तो हे पाहतच होता. दोघांचेही डोळे ओसंडून वाहत होते आणि मी त्याच्यासमोर त्याला तिथून कायमचं ब्लॉक केलं आणि एवढंच म्हणलं, आयुष्यातली सगळी सुख दुःखे समोरासमोर भेटून बोलत जाऊया, हात हातात धरून संवाद साधत राहूया, आपल्या नात्यात संवाद साधण्यासाठी असल्या कुठल्याच माध्यमाची आपल्याला गरज पडता कामा नये, असं म्हणत दोघेही एका ताटात जेवलो. इथं सेल्फी काढावा वाटला मला पण तो मोह आवरला. तसाच मी माझ्या घरी आलो आणि तो त्याच्या घरी राहिला.

आज कायमचं अंतर वाढत जाणार होतं. मी अंतर वाढवणाऱ्या गोष्टीच संपवून टाकल्या.

मित्रांनो संवाद साधणारी माध्यमे आज प्रत्येक घरात आहेत. आपण याच्याशी कनेक्ट झालोय. जग जवळ आल्याची फिलिंग आपण अनुभवत असताना आपली नाती दुरावत तर चालली नाहीत ना? याचे भान आपल्या प्रत्येकाला असायला हवे म्हणूनच हे लिहावं वाटलं मला.

खालील कवितेच्या ओळी माझ्या मनाचा अंतरंग अक्षरशः ढवळून काढत आहेत त्या ओळी ………

एकविसाव्या विज्ञान युगात

ही केवढी मोठी घोडचूक

रक्ताच्या नात्यालाही आज

लागते व्हाट्सअप आणि फेसबुक….

आणि खरं सांगू तुम्हाला,

खरच आपली जेवढी रक्ताची, जवळची, जी आपली असणारी माणसं, जिथं खरंच या लोकांशी समोरासमोर हातात हात घेऊन संवाद व्हायला हवा असं वाटणारी माणसं जी आहेत ना, त्यांना व्हाट्सअप वरून कायमचं ब्लॉक करा. काळजाचा डेटा कायम चालू ठेवा. तिथून ही नाती कधीच ब्लॉक होऊ देऊ नका. एकमेकांशी संवाद साधत, डिजिटल होता होता नाती जपता जपता आनंदाने जगता येईल आपण तसे जगुया.

लेखक – अनामिक

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सेवाग्राम… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

सेवाग्राम☆ सौ कल्याणी केळकर बापट

मागे येऊन गेलेल्या कोरोनाच्या लाटेने आपली सगळ्यांमध्ये भ्रमंती, पर्यटन ह्या बाबतीत विचार  करायची असलेली खरतरं शक्तीच काढून घेतलीय. एरवी आपल्याला सवय असते अगदी दोनचार दिवस जरी मोकळे,सवडीचे मिळाले की आपण लगेच कुठेतरी जवळपास का होईना पण सहपरीवार वा मित्रमंडळींसोबत सहलीस जाण्याचे ईमले बांधायला लागतो. ह्या फिरस्तीच्या आवडीच्या नादापायी खूपदा लांबवरचा,दूरवरचा प्रदेश आपण आवर्जून बघतो मात्र आपल्या जवळचा आसपासचा प्रदेश मात्र पाहू पाहू करीत बघायचा राहूनच जातो.भलेही हा जवळील सुप्रसिद्ध प्रदेश आपल्या डोळ्याखालून जात नाही मात्र दूरदूरचे लोक ह्याला भेट देण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी दूरवरून येतात.

आमचा विदर्भ हा चांगल्या गोष्टींसाठी प्रसिद्ध असणे ही बाब आम्हां सगळ्यांसाठीच अभिमानाची आहे.विदर्भ सुद्धा संतमहात्मे, थोर पुरुष ह्यामुळे ओळखला जाऊ लागला तर ही बाब आपणांसाठी जरा जास्तच गौरवाची ठरते.

विदर्भातील वर्धा जिल्हा हा सेवाग्राम व पवनार ह्या पवित्र भूमींसाठी सुप्रसिद्ध.  ८ एप्रिल. हा दिवस आचार्य विनोबा भावे ह्यांच्या पवनार आश्रमाच्या स्थापनेचा दिवस. खरोखरच अशी ठिकाणं बघितली की नतमस्तक व्हायला होतं.आता थोडसं आचार्य विनोबाजी आणि पवनार आश्रमाबद्दल जाणून घेऊया.

आपली आई ही बहुतेक प्रत्येक व्यक्तीचं दैवत,गुरु असते. लहानपणी तर आई हेच बाळाचे सबकुछ असते असही म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आपल्या आईसाठी आपल्याला काही करता आलं तर त्याचं आत्मिक समाधान काही ओरचं लाभतं बघा. अशाच एका असामान्य व्यक्तीने आपल्या आईसाठी संस्कृत मध्ये असलेली भगवद्गीता ही समजण्यास सोप्प्या मराठी भाषेत लिहीली  तीच ही “गीताई” होय. ती व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपले आचार्य विनोबाजी भावे होतं.

11 सप्टेंबर 1895 रोजी कोकणात विनोबाजींचा जन्म झाला. आज त्यांची जयंती.त्यांना विनम्र अभिवादन.भारतीय संस्कृती व जीवनशैलीबद्दल त्यांचा विशेष अभ्यास होता. राष्ट्रभाषा हिंदी असावी व लिपी देवनागरी असावी, असा त्यांचा आग्रह होता.

वेगवेगळ्या भाषांच ज्ञान अवगतं असणं हा खरोखरीच कौतुकाचा विषय. साधारण तीन चार भाषांच्या वर जर कोणाला जास्ती भाषा अवगतं असतील तर मला त्या व्यक्तींच खूप कौतुक वाटतं.ह्या अवलीयांना तर तब्बल  १४ भारतीय भाषा येत होत्या. वेद आणि आश्रम व्यवस्थेवर त्यांचा गाढा विश्वास आणि अभ्यास होता.

मा. विनोबाजींनी भरपूर प्रमाणात जमीनीचा मालकी हक्क असलेले जमीनदार व भूमिहीन जनता ह्यामधील प्रचंड तफावत व  त्यापासून निर्माण झालेली दरी जाणली आणि मग त्यांनी सुरू केली स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाची कामगिरी म्हणजे भूदान चळवळ. देशातील जमीनदारांनी त्यांच्या जमिनीचा सहावा हिस्सा भूमिहीनांसाठी दान करावा, असे त्यांचे आवाहन होते. १९५१ साली काही लोकांनी तेलंगण भागात जमीनदारां  विरुद्ध संघर्ष केला. तेव्हा जमिनीची योग्य वाटणी केली तरच खरी सामाजिक क्रांती होऊ शकेल, अशी भूमिका विनोबांनी घेतली. केवळ समाज प्रबोधनातून ७० दिवसांत त्यांना सुमारे १२ हजार एकर जमीन मिळाली.

त्यांचा कोणताही विचार वा दृष्टिकोन हा वैश्विक असायचा.महात्मा गांधींचे ते एकनिष्ठ अनुयायी होते.१९४८ साली महात्मा गांधींच्या निधनानंतर निर्माण झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर विनोबांनी सत्य-अहिंसा व सर्वधर्मसमभावावर आधारलेला सर्वोदयाचा मार्ग सांगितला. म्हणूनच जणू ह्या गांधीजींच्या तत्त्वावरील ‘श्रद्धा’ परत मजबूत करण्याचे काम त्यांनी केले, असे मानले जाते. आचार्य दादा धर्माधिकारी यांचे या कामी त्यांना बहुमोल सल्ला व सहकार्य लाभले.

आपला सर्वांगीण व्यासंग वाढवितांना त्यांनी कुराणाच्या मराठी भाषांतरापासून ते गीताई पर्यंत अनेक ग्रंथ लिहिले. ‘साम्ययोग’ नावाचे मासिक ते पवनार आश्रमातून काढत होते. विनोबाच्या इतर ग्रंथात ऋग्वेदसार, ईशावास्य वृत्ती, वेदान्ससुधा, गुरुबोधसार, भागवतधर्म प्रसार यांचा समावेश आहे. त्यांचे ‘मधुकर’ नावाचे पुस्तक आबालवृद्धात परिचित होते.

विदर्भाचा गौरव म्हणून आपल्याला त्यांच्या पवनारच्या आश्रमाचा उल्लेख करता येईल.त्या आश्रमात त्यांनी बाजार गाठावा लागणारं नाही हे तत्व बाळगून शेतीमध्ये भाजीपाला व धान्य पिकवायला सुरवात केली. त्यांनी ऋषीशेती चा प्रघात सुरू केला.धाम  नदीचे तीरावर आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम आहे. हा आश्रम १५ एकर जागेवर् विस्तारलेला आहे. ह्यात खुप् जैविक विविधता आहे. अनैसर्गिक गोष्टींपासून खुप दुर आणि निसर्गाच्या सान्निध्यात वसलेला असा हा आश्रम ईथे येणा-या लोकांना आकर्षित करतो.  विनोबांनी हा आश्रम खास करून् महिलांसाठी चालु केला. येथे येणा-या महीला साध्वी किंवा  उपासक होत्या. विनोबाजींनी वय वर्षे पन्नास ते सत्तर च्या दरम्यान अख्खा भारत पालथा घातला.त्या द्वारे जनजागृती पण त्यांनी केली.अशा या गौरवशाली व्यक्तीचा सन्मान भारतसरकारने 1983 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा पदवी देऊन केला.

दिवाळीच्या सुमारे सात दिवस आधी विनोबांनी ‘प्रायोपवेशन’ सुरू केले. प्रशासनातील मोठे अधिकारी जिल्हाधिकारी, शल्यचिकित्सक, पोलिस अधीक्षक यांच्या उपस्थितीत व असंख्य कार्यकर्त्याच्या गराड्यात विनोबांनी १५ नोव्हेंबर १९८२ रोजी म्हणजे दिवाळीच्या अमावस्येच्या दिवशी सकाळी देहत्याग केला. पंतप्रधान इंदिरा गांधींपासून सर्व राज्याचे राज्यपाल व मुख्यमंत्री त्यांच्या अंत्यसंस्कारास्तव आश्रमात उपस्थित होते.

आज पवनार आश्रमाच्या स्थापनेच्या दिवसामुळे विनोबाजींचे थोर कार्याची परत एकदा उजळणी झाली.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- माझ्याही समोर पुढे आयुष्यभर हे असे कसोटीचे क्षण येणार आहेत याची मला कल्पना कुठून असायला? पण म्हणूनच ‘त्या’च्यापर्यंत पोहोचणारा माझा प्रवास ‘त्या’चेच बोट धरून अगदी निश्चिंतपणे सुरू झाला होता एवढं खरं !!)

तथाकथित चमत्कारांवर माझा विश्वास नाही. चमत्कारांवर विश्वास ठेवून भ्रमित होणंही योग्य नाही असंच मला वाटतं. त्या

बालवयातल्या मी प्रमुख साक्षीदार असणाऱ्या अनेक प्रसंगांच्या बाबतीत मात्र हे असं विश्लेषण करायची पात्रता त्यावेळी माझ्याजवळ नव्हती म्हणून असेल पण तेव्हा तरी ते चमत्कारच वाटले होते. आज इतक्या वर्षानंतर त्या प्रसंगांचं पुनरावलोकन करताना मात्र मी म्हणेन की ते प्रसंग चमत्कार नसले तरी अनाकलनीय मात्र नक्कीच होते आणि त्यामागे ईश्वरी कृपालोभाचे संकेतही निश्चितच होते

आमच्या कुरुंदवाडच्या वास्तव्यातले असेच हे प्रसंग. तिथे बाबांचा नित्यदर्शनाचा नेम प्रतिकूल परिस्थितीतही कसा निष्ठेने सुरू होता हे यापूर्वीच सविस्तरपणे सांगितलेले आहेच. त्यांच्या या निरपेक्ष सेवेनंतर ते निश्चितच कसोटीला उतरले असणार. एरवी हा प्रसंग अशा पद्धतीने घडलाच नसता.

तो काळ साधारण १९५४ ते १९५८ चा. विष्णूमंदिराच्या जवळच्या लेलेवकिलांच्या वाड्यात आमचं बिऱ्हाड होतं.‌ मोठं स्वैपाकघर आणि माडीवरची प्रशस्त खोली आमच्याकडे आणि स्वतंत्र स्वयंपाकघर असलेल्या बाकी पाच खोल्यांचा ऐवज लेले कुटुंबासाठी अशी विभागणी होती.‌दोन्ही कुटुंबे दूरच्या नात्यातलीच. त्यामुळे एकाच घरातले हे वेगवेगळे वास्तव्य केवळ सोय आणि सोबत म्हणून दोघांनी मनापासून स्वीकारलेलं होतं.

माझ्या पाठच्या भावाचा जन्म तिथलाच. ऑगस्ट १९५६ चा. त्याच्याच जन्माच्या वेळची ही गोष्ट. धुवांधार  पावसामुळे शेजारच्या आनेवाडीला  (हा पंचगंगेचा एक फाटा) नेहमीप्रमाणे पूर आलेला. पुराचे पाणी गावभर पसरत आमच्या वाड्याच्या मुख्य उंबऱ्याला लागलेले आणि धुवांधार पाऊस सुरूच. आईचे दिवस भरत आले होते.पाऊस असाच कोसळत राहिला तर पाणी कुठल्याही क्षणी घरात घुसू शकेल अशी ती अवेळ. त्यामुळे मुलांना वरच्या माडीवर झोपवून दोन्ही कुटुंबातली मोठी माणसं रात्रभर एकत्र पडवीतच बसून होती. त्या काळात बाळंतपणाला सुईणच घरी यायची. पण या पावसा-पूरात सुईण येणार कशी ही विवंचना होती ती वेगळीच!

“दादा, आता काय करायचं?” लेले वकील बाबांना म्हणाले. बाबा काळजीत होतेच. त्यांनी आईकडे पाहिलं. खरंतर अशा परिस्थितीत आईचा जीव टांगणीला लागायला हवा होता पण निदान वरकरणी तरी ती शांतच होती.

“आपण काय करणार? होईल ते पहात रहायचं.” ती शांतपणे म्हणाली.

“ते खरंच.पण तुम्हाला अचानक त्रास सुरू झाला तर..?” लेलेकाकू तिच्या जवळच बसल्या होत्या,त्या म्हणाल्या. त्यांच्या  बोलण्यात त्यांच्या मनातली काळजी लपून रहात नव्हतीच.  स्वतःचीच समजूत घातल्यासारखं आई म्हणाली,

“त्या सगळ्याचा भार दत्त महाराजांवर. संकट नाही यायचं. आणि आलंच तर शेवटी त्याचं निवारणही तेच करतील.”

परिस्थिती चिंताजनक असूनसुद्धा आईच्या शब्दांमुळे इतरांच्या मनावरचं ओझं थोडं तरी हलकं झालं. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर खूप वेळाने तिथे पडवीतच पसरलेल्या अंथरुणांवर सर्वजण आडवे झाले तरी कुणाच्याच डोळ्याला डोळा नव्हता. आणि आश्चर्य म्हणजे पहाटेच्या आसपास पावसाचा जोर हळूहळू ओसरत चालला आणि फटफटीत उजाडेपर्यंत उंबऱ्याशी येऊन ठेपलेल्या पाण्याने दोन पावलं माघार घेतली होती! आईचे दिवस भरत आल्याचं दडपण तिकडे सुईणीच्या मनावरही होतंच. त्यामुळेच ती विषाची परीक्षा नको म्हणून,स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सकाळी सकाळीच चिंब भिजल्या अवस्थेत कमरेपर्यंतच्या पाण्यातून चालत आमच्या घरी मुक्कामाच्याच तयारीने येऊन पोचली तसा सर्वांचा जीव भांड्यात पडला! त्याच दिवशी दुपारी बाळाचा सुखरूप जन्म झाला!पण…?

अतिशय अनपेक्षितपणे सगळं सुरळीत पार पडल्याचं समाधान मात्र दीर्घकाळ टिकणार नाहीय याची कुणालाच कल्पना नव्हती. कारण दुसरं जीवघेणं संकट दबा धरून बसलेलं होतंच!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उगवतीचे रंग – आनंदाची गुढी ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ उगवतीचे रंग – आनंदाची गुढी ☆ श्री विश्वास देशपांडे

फाल्गुन मासातल्या होळीबरोबर थंडी पण संपते आणि येणारा चैत्र महिना नवीन वर्षाचा संदेश घेऊन येतो. पण तो नुसता येत नाही. आनंदाचे प्रतीक म्हणून तो खूप काही गोष्टी आपल्यासोबत आणतो. तसं तर चैत्र हा शब्द चित्रा नक्षत्रावरून आला आहे. चित्र म्हणजे विविधता. या चैत्र महिन्यात किती तरी विविध गोष्टी निसर्ग आपल्यासाठी घेऊन येतो. वसंत ऋतूचे आल्हाददायक आगमन झालेलं असतं. वसंत हा खरं तर ऋतूंचा राजाच म्हणायला हरकत नाही. या वसंतात सृष्टी गंधवती होते. झाडं आपली जुनी वस्त्रं टाकून नवीन रेशमी पर्णसाज परिधान करतात. तांबूस कोवळी, पोपटी, हिरवीकंच पाने जणू नैसर्गिक तोरणाचा साज सृष्टीला चढवतात. निरनिराळी फूल फुलून आलेली असतात. गुलाब, मोगरा यासारखी अनेक फुलझाडं आपल्या सुगंधानं वातावरण प्रसन्न करतात. आम्रवृक्षासह विविध झाडांना आलेला मोहर, वातावरण धुंद करीत असतो. कोकिळेचा पंचम स्वर आसमंतात निनादत असतो. अशाच प्रसन्न वातावरणात मराठी महिन्यातला पहिला दिवस वर्षातला पहिला आनंदाचा सण घेऊन येतो. घराघरांवर गुढ्या उभारल्या जातात.

रावणाचा वध करून प्रभू श्रीराम अयोध्येला परत आले तेव्हा अयोध्येच्या प्रजाजनांनी गुढ्या तोरणे उभारून रामरायाचे स्वागत केले. या दिवशी रेडिओवर माणिक वर्मांच्या भावपूर्ण आवाजातलं गाणं हमखास ऐकायला येतं आणि आपलं मन प्रसन्न करतं.

विजयपताका श्रीरामाची

झळकते अंबरी

प्रभू आले मंदिरी

*

गुलाल उधळून नगर रंगले

भक्तगणांचे थवे नाचले

रामभक्तीचा गंध दरवळे

गुढ्या तोरणे घरोघरी ग.

किती सुंदर शब्द ! खरोखरच वातावरणात रामभक्तीचा गंध दरवळत असतो. कारण गुढीपाडव्यापासून श्रीरामांच्या नवरात्राला सुरुवात होते. आपले सण, उत्सव किती सुंदर तऱ्हेने निसर्गाशी आणि ईश्वराशी जोडले आहेत. निसर्ग आणि मानव यांच्यातील अतूट नाते तेव्हाच त्यांना उमजले होते. पर्यावरण जपणे, त्याच्या साथीने जगणे हा त्यांच्या जीवनाचाच जणू एक भाग झाला होता. इको फ्रेंडली वगैरे शब्द आपण आज वापरत असलो तरी त्यावेळी जे काही होते, ते सगळेच इको फ्रेंडली होते. असे सण साजरे करण्यामागे पूर्वजांची दृष्टी किती विशाल आणि उदात्त होती, याचे प्रत्यंतर या सगळ्या सणांमागील पार्श्वभूमी जेव्हा आपण समजून घेतो, तेव्हा लक्षात येते. त्यामागे असणारा आरोग्याचा दृष्टिकोन, सामाजिक एकतेचा संदेश खूप महत्वाचा असतो. पण आपण जेव्हा हा उद्देश समजून न घेता हे सणवार साजरे करतो, तेव्हा मात्र ती एक औपचारिकता होते. सुटी, खाणेपिणे, मौजमजा यातच दिवस व्यतीत होतो. नवीन पिढीच्या दृष्टीने तर आपल्या या प्रथा, परंपरा समजून घेणे आवश्यक वाटते तरच भविष्यात आपली संस्कृती, सामाजिक एकोपा टिकून राहील.

गुढीपाडवा हा सण देशाच्या सगळ्या भागात साजरा होतो. दक्षिण भारतात त्याला युगादी किंवा उगादी असे म्हटले जाते. काही ठिकाणी पाडो किंवा पाडवा असेही म्हटले जाते. गुढीपाडवा हा सण आजचा नाही. असे ,म्हणतात की ब्रह्माने याच दिवशी सृष्टी निर्मिली. गुढीपाडव्याचे संदर्भ हजारो वर्षांपासूनच्या वाङ्मयात आपल्याला मिळतात. अगदी रामायणापासून त्यांची सुरुवात होते. गुढी या शब्दाचा अर्थ तामिळ भाषेत लाकूड किंवा काठी असा होत असला आणि प्राचीन मराठी वाङ्मयात गुढी या शब्दाचा झोपडी, कुटी वगैरे असा असला तरी खरं म्हणजे गुढी हा शब्दच आनंदासाठी आला आहे. एखादं मोठं काम करणं, शत्रूवर विजय प्राप्त करणं, हाती घेतलेल्या कामात यश मिळणं या सगळ्या गोष्टींसाठी गुढी उभारणे असा वाक्प्रयोग केला जायचा. माधवदासांनी लिहिलेल्या ‘ उत्कट साधूनि शिळा सेतू बांधुनी… या श्रीरामांच्या मराठी आरतीत पुढील ओळी किती सुंदर आहेत बघा –

प्रथम सीताशुद्धी हनुमंत गेला ।

लंकादहन करुनी अखया मारिला ।।

मारिला जंबू माळी, भुवनी राहाटीला ।

आनंदाची गुढी घेऊनिया आला ।।

श्रीरामांनी रावणाचा वध केल्यानंतर म्हणजेच एक अलौकिक असे कार्य संपन्न केल्यानंतर हनुमंत आनंदाची गुढी घेऊन आला. इथे गुढी म्हणजे विजयपताका असा अर्थ घेता येईल. अयोध्येच्या नगरजनांनी सडे शिंपून, रांगोळ्या काढून आणि गुढया तोरणे उभारून श्रीरामांचे स्वागत केले. श्रीकृष्णाने कंसाचा वध केला तेव्हाही नगर वासियांनी श्रीकृष्णाचे असेच स्वागत केले होते असे म्हणतात. महाभारताच्या आदिपर्वात गुढीचा उल्लेख आढळतो. खरं तर असाही अर्थ घेता येईल की आपला देह हीच एक नगरी आहे. आपल्या हृदयमंदिरात आपण आनंदाची गुढी उभारून श्रीराम, श्रीकृष्ण यांचे स्वागत करतो. त्यासाठी हृदयाचे दरवाजे उघडे हवेत. आपल्या मनातील काम, क्रोध आदी वासना जेव्हा नष्ट होतील, त्यांच्यावर विजय प्राप्त होईल, तेव्हाच श्रीरामांचा प्रवेश आपल्या हृदयमंदिरात होईल. परमेश्वर हा आनंदस्वरूप आहे. तो सत चित आनंद म्हणजेच सच्चीदानंद आहे. तो आपल्या हृदयात प्रवेशला की आनंदाची गुढी आपोआपच उभारली जाते.

स्त्रीला आदिशक्ती मानून तिची पूजा पूर्वीपासून केली जाते. माता पार्वती म्हणजे आदिशक्ती. शंकर आणि पार्वती यांचा विवाह पाडव्याच्या दिवशी ठरला आणि तृतीयेच्या शुभमुहूर्तावर तो पार पडला. तेव्हापासून पाडव्याला स्त्रीच्या रूपात आदिशक्तीची पूजा केली जाते. गुढीपाडव्याचा उल्लेख म्हाईंभट यांनी लिहिलेल्या लीळाचरित्रातही आढळतो. ज्ञानेश्वरीत सुद्धा गुढीचा उल्लेख येतो. ज्ञानेश्वर माउली म्हणतात-

अधर्माची अवधी तोडी । दोषांची लिहिली फाडी ।

सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवी ।।

अधर्म आणि दोष नष्ट करणारी सुखाची गुढी मी उभवितो. कोणाकडून ? तर सज्जनांकडून. सुखाची गुढी सज्जनच उभारू शकतात. संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखामेळा यांच्या वाङ्मयातही गुढीचे उल्लेख आढळतात. चोखोबा तर म्हणतात-

टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची ।

चौऱ्याऐंशी लक्ष योनीतुन प्रवास करून आल्यानंतर दुर्लभ असा मानवदेह प्राप्त होतो. नरदेह प्राप्त होणे म्हणजे आनंदाची गुढी ! म्हणून भगवंताच्या भक्तीत रंगून जाऊन आनंदाने टाळी वाजवावी.

गुढी हे मानवी देहाचंही प्रतीक आहे. आपल्या पाठीतून जाणारा मेरुदंड म्हणजे वेळू किंवा काठी. त्यावर आपले डोके म्हणजे घट. गुढीवरचे रेशमी वस्त्र म्हणजे जणू मानवी देह. त्यावर असणारी कडुलिंबाची आणि आंब्याची पाने म्हणजे मानवी जीवनातील सुखदुःखाचे प्रतीक. गुढीला घातलेला साखरेचा हार किंवा गाठी म्हणजे परमेश्वराचे प्रतीक. जेव्हा आपण आपली सुखदुःखे त्या परमेश्वररूपी साखरेच्या गोड चवीबरोबर मिसळून घेतो, तेव्हा जीवनही गोड, अमृतमय होते. आरोग्याच्या दृष्टीनेही कडूलिंबाच्या पानांचे महत्व आहे. लिंबाची पाने चवीला कडू असली तरी गुणधर्माने थंड आहेत. पुढे सुरु होणाऱ्या कडक उन्हाळ्याला तोंड देता यावे म्हणून कडुलिंबाच्या पानांची चटणी गूळ, मीठ, मिरपूड इ. घालून खातात.

संत एकनाथांच्या रचनांमध्ये तर अनेकवेळा गुढीचा उल्लेख आपल्याला आढळतो. जेव्हा आपण काहीतरी विशेष अशी गोष्ट साध्य करतो, तेव्हा विविध रूपांमध्ये गुढीचे प्रतीक त्यांना भासमान होते. मग ती गुढी हर्षाची, ज्ञातेपणाची, भक्तीची, यशाची, रामराज्याची रोकडी, जैताची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची, सायुज्याची, निजधर्माची अशी विविध प्रकारची आहे. गुढी वारीत आणि रणांगणातही उभविली जाई. जशी एखादी ज्योत ( बटन ) खेळाडूंकडून पुढे नेली जाते, तशीच ती चपळ माणसांच्या हस्ते युद्धात आणि वारीत पाठवण्यात येई. त्याद्वारे काही संकेत दिलेले असत. तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात –

पुढे पाठविले गोविंदे गोपाळा । देऊनिया चपळा हाती गुढी ।।

शालिवाहन राजांची गोष्ट तर प्रसिद्धच आहे. शालिवाहनांच्या राज्यात अपार समृद्धी होती. पण त्यामुळे प्रजेत आळस आणि सैन्यामध्ये उत्साह आणि चपळता राहिलेली नव्हती. कुठलीही गोष्ट एकाच ठिकाणी वापर न होता पडून राहिली की ती गंजते किंवा बिनकामाची ठरते. तसेच शालिवाहनाच्या सैन्याचे झाले होते. शत्रूच्या आक्रमणाला तोंड देण्याचे सामर्थ्य त्यांच्यात राहिले नव्हते. अशातच शकांचे आक्रमण राज्यावर झाले. मग काय करायचे ? सैन्याला प्रशिक्षण द्यायचे किंवा नवे सैनिक भरती करायचे तर काही वेळ जाणारच. मग शालिवाहनांनी हजारो मातीचे सैनिक, हत्ती, घोडे तयार केले. त्याच्या साहाय्याने त्यांनी जुलमी अशा शकांचा पराभव केला. मग तो विजय लोकांनी गुढया तोरणे उभारून साजरा केला. तेव्हापासून शालिवाहन शक सुरु झाला. पण खरंच मातीचे सैनिक, हत्ती, घोडे लढले असतील का ? मला वाटतं त्याचा प्रतीकात्मक अर्थ आपण घ्यायला हवा. शालिवाहन राजाचे सैन्य मृत्तिकेसमान म्हणजे चैतन्यहीन, निरुत्साही झाले होते. त्यांच्यात मरगळ आली होती. मातीच्या सैन्यात प्राण फुंकणे म्हणजे त्यांच्यातील चैतन्याला आवाहन करणे, त्यांच्यातील स्वत्व, स्वाभिमान, शौर्य, देशाभिमान जागृत करणे. किती सुंदर अर्थ आहे हा !

जेव्हा जेव्हा समाजात अशी स्वत्वहीनता, मरगळ आणि गुलामगिरीची वृत्ती अंगवळणी पडते, तेव्हा तेव्हा त्या समाजात असेच प्राण फुंकावे लागतात. वर्षानुवर्षे गुलामी रक्तात भिनलेल्या समाजात असे चैतन्य समर्थ रामदास स्वामी, तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले म्हणूनच शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीची गुढी उभारता आली. स्वातंत्र्यपूर्व काळात असे चैतन्य लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पं नेहरू, लाल बहादूर शास्त्री, सरदार पटेल, डॉ आंबेडकर, स्वा सावरकर यांच्यासारख्या नेत्यांच्या आणि क्रांतिकारकांच्या तेजस्वी त्यागातून निर्माण झाले आणि स्वातंत्र्याची गुढी उभारली गेली.

गुढी ही उंच उभारली जाते. ती आशाअपेक्षांचे प्रतीक असते. ती जणू आपल्याला सांगते, तुमचे ध्येय, आशा, अपेक्षा अशाच उंच असू द्या. त्यांना मर्यादा घालू नका. स्काय इज द लिमिट ! आपल्या नवीन वर्षाचा आरंभ या सणाने होतो म्हणून वर्षारंभीचे उत्तम, उदात्त असे संकल्प मनाशी योजा आणि वर्षभरात आपल्या प्रयत्नांनी ते तडीस न्या. हाच गुढीपाडव्याचा संदेश आहे.  कवयित्री बहिणाबाई फार सुंदर संदेश आपल्याला आपल्या कवितेतून देतात. त्या म्हणतात –

गुढीपाडव्याचा सन, आता उभारा रे गुढी

नव्या वरसाचं देनं, सोडा मनातली अढी

गेली साली गेली आढी, आता पाडवा पाडवा

तुम्ही येरयेरांवरी लोभ वाढवा वाढवा.

या बहिणाबाईंच्या सांगण्याप्रमाणे मनातली अढी सोडून देऊन एकमेकांवरचे प्रेम वाढवू या. आनंदाची गुढी उभारू या.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “गुढीपाडवा…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “गुढीपाडवा…” ☆ सौ राधिका भांडारकर 

शालिवाहन या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय. तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्व आहे. या संदर्भात एक अख्ख्यायिका आहे.

शालिवाहन राजाने मातीची माणसे बनवली. त्यावर पाणी शिंपडून त्यांच्यात प्राण भरला आणि हेच होते शालिवाहनाचे  सैन्य. या सैन्याच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला. या विजया प्रित्यर्थ शालिवाहन शके सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते.  या दिवशी पंचांग वाचन आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत केले जाते.

महाभारतातील आदीपर्वा मध्ये उपरीचर नामक राजाने इंद्रा कडून मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीत रोवली आणि त्या काठीची पूजा केली. हा दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदेचा. नवीन वर्षाचा आरंभ दिन म्हणून या दिवसाला  गुढीपाडवा असे म्हणून साजरा करण्याची पद्धत आहे.

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस. ब्रह्मदेवाने विश्व निर्मिती केली ती याच दिवशी आणि पुढे सत्य युगाची सुरुवात झाली.  या दिवशी विश्वातील तेज तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक संचित करायचा प्रयत्न करतो.

भगवान विष्णूने  मत्स्य रूप धारण करून शंखासुराचा वध केला तोही दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा.

लंकाधीश  रावणाचा वध करून श्रीराम १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येस परतले आणि अयोध्या नगरवासीयांनी घरावर गुढ्या, तोरणे उभारून आनंदोत्सव साजरा केला म्हणूनच गुढीपाडवा म्हणजे विजय दिन.  हा दिवस  देशभर साजरा केला जातो.

गुढीपाडवा साजरा करण्या संदर्भात अशा अनेक आख्यायिका आहेत पण या दिवसा मागे एक निसर्ग तत्त्वही आहे. गुढीपाडव्या निमित्ताने त्याचाही विचार व्हायला हवा.

शिशिरातील पानझडी नंतर ऋतुचक्र हळुवार कूस पालटते आणि पर्णहीन वृक्षांना नवचैतन्याची चाहूल लागते, रंगविभोर फुलांनी डवरलेल्या वृक्षाचं पुष्पवैभव, आंबेमोहराचा सुगंध, कोकिळेचा वसंत पंचम एका सर्जनशील ऋतुच्या आगमनाची वर्दी घेऊन येतो. रंग, रूप, गंध! नाद स्पर्शातील शालीनता म्हणजे वसंतागमनाची नांदी आणि त्यासाठीच गुढीपाडव्याच्या निमित्ताने केलेला चैत्र शुद्ध प्रतिपदेचा, नववर्षाचा, आरंभाचा आनंदोत्सव.

युगादि तथा उगादी या नावानेही हा दिवस साजरा केला जातो. (आंध्र प्रदेशात) पडव, पाडवो या संस्कृत शब्दाचा मराठी अपभ्रंश पाडवा. याचा अर्थ  चंद्राची कला. चैत्रशुद्ध प्रतिपदे नंतर चंद्र कले कलेने वाढतो म्हणून यास चैत्र पाडवा म्हणतात. आपले पूर्वज निसर्गा विषयी कृतज्ञता पाळण्यासाठी सूर्य, चंद्र, पर्वत, नदी, वृक्ष यासारख्या निसर्ग स्वरूपाची पूजा करायचे त्यातूनच या प्रतीकात्मक गुढीची निर्मिती झाली.

गुढी म्हणजे ब्रह्मध्वज— विजय ध्वज. पराक्रम, विजय, सर्जनशीलता, उत्पत्ती आणि चैतन्य यांचे प्रतीकात्मक पूजन म्हणजे गुढीपाडवा.

घराचा दरवाजा, खिडकी, अथवा गच्ची भोवतालची जागा  स्वच्छ करून धान्य आणि रांगोळीने सजलेल्या पाटावरून मोकळ्या आकाशात सहा ते सात फूट उंचावर एक काठी उभारावी त्यावर साडी व जरीचे वस्त्र गुंडाळावे, वरती तांब्याचा किंवा कोणत्याही धातूचा कलश उपडा ठेवावा, फुलांची माळ, कडुनिंबाचा पाला आणि साखरगाठीने  काठी सजवावी.

अशा रीतीने गुढीची पूजा करण्यामागे काही शास्त्रीय संदर्भ आहेत. गुढी म्हणजे ब्रह्मध्वज हे मनुष्य देहाचेही प्रतीक आहे. गुढीसाठी वापरण्यात येणारी काठी म्हणजे आपल्या मेरुदंडाचे, मणक्याचे,कण्याचे प्रतीक आहे. शरीराला ताठ उभे करण्यासाठी जसा मणका गरजेचा तसा गुढीचा हा बांबू! शरीर केवळ हाडांसह चांगले कसे दिसेल? त्यावर मासाचे आवरण असते म्हणून बांबूला रेशमी वस्त्रादी  गोष्टींने सजविले जाते आणि त्यावर मस्तकरुपी कलश ठेवला जातो.

वैज्ञानिकतेच्या नजरेतूनही याचे महत्त्व आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रजापतीच्या प्रकाश लहरी सर्वाधिक प्रमाणावर धरतीवर येतात. गुढीवरचा उपडा कलश म्हणजे जणू काही डिश अँटेनाच. तो वातावरणातल्या या  लहरी खेचून घेतात आणि या लहरींचा स्पर्श छताखाली राहणाऱ्या लोकांना होतो. या लहरींनी जमिनीची उत्पादन क्षमता ही वाढते म्हणूनच शेतकरी या महिन्यात शेतीची नांगरणी करतात.

गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाच्या पानांचंही खूप महत्त्व आहे. गुढीचा प्रसाद म्हणून धणे, गुळ आणि कडुनिंबाचा पाला यांचे एकजीव मिश्रण दिले जाते. कडूनिंब म्हणजे पुराणातला परिभद्र वृक्ष. हा संजीवक वृक्ष आहे आणि यांच्या पर्णसेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. चैत्रात हा नवी पालवी धारण करतो म्हणून नवचैतन्य देणाऱ्या कडूनिंबाचे या दिवशी फार महत्त्व आहे.

कडुनिंबाचं कडूपण आणि साखरगाठीचा गोडवा …किती सूचक मिश्रण आहे हे! माणसाचं जगणं असंच असतं ना थोडं कडू थोडं गोड. काही वेळा कटू बोलावं लागतं, ऐकावही लागतं आयुष्यातली कडू ही चवही अपरिहार्य आहे आणि असं बघा सगळंच गोड असतं तर जगण्यासाठी काही आव्हान उरलं असतं का?

आता या सणा मागची आणखी एक गंमत! थोडा मिस्कीलपणा! ज्यात आपलं बालपण सांचलेलं आहे. चिडवत होता की नाही तेव्हा ….”गुढीपाडवा आणि नीट बोल गाढवा”

आता याचा विचार करताना  वाटते या गमतीदार शब्दसमूहात केवळ यमकच नव्हे तर एक सहज मारलेली आपुलकीची टप्पल आहे हो! जगण्याचं भान देणारी टप्पल.. गुढीपाडव्याच्या सणानिमित्त मिळणारा एक आनंदाचा संकेत आणि संस्कार.

आपणा सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!!

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मराठी साहित्यातील अजरामर पत्रे… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

मराठी साहित्यातील अजरामर पत्रे ☆ श्री विश्वास देशपांडे

माझीा मुलगी पुण्यात शिक्षणासाठी राहायची, तेव्हा दर आठवड्याला तिचे मला एक पत्र यायचे.मुलगा शिकायला होता, तेव्हा तोही पत्र पाठवायचा. त्यांच्या पत्रांची आम्ही आतुरतेने वाट पाहत असू. त्यातील काही सुंदर पत्रे आजही आम्ही जपून ठेवली आहेत. पत्राच्या सुरुवातीला लिहिलेले ‘ प्रिय दादा, किंवा प्रिय आई ‘ हे शब्द अंगावर मोरपीस फिरल्यासारखे जादू करायचे. आणि शेवट ‘ तुमची लाडकी, तुमचा लाडका ‘ यासारख्या हृदयस्पर्शी शब्दांचा असायचा. दुसरे नवीन पत्र येईपर्यंत आधीचे पत्र दोनतीन वेळा तरी वाचून झालेले असायचे. आताशा  पत्र लिहिणे हा भाग कालबाह्य होत चालला असला तरी एक काळ असा होता, की ज्यावेळी पत्रांच्या माध्यमातूनच एकमेकांशी संवाद साधला जायचा. दूर अंतरावर असणाऱ्या आपल्या प्रिय जनांशी संवाद साधण्याचे ते एक प्रभावी माध्यम होते.

आजही आपल्यापैकी काहींनी आपल्या वडिलांनी आपल्याला लिहिलेलं पत्र , भावाने लिहिलेलं पत्र वा अन्य कोणी लिहिलेलं पत्र आठवण म्हणून जपून ठेवलं असेल. ही पत्रं म्हणजे एक अनमोल ठेवा असतो. कधी त्या माणसांची आठवण आली, तर ती पत्रं पुन्हा वाचावी. त्यासारखा दुसरा आनंद नाही.

जी ए कुलकर्णी या प्रख्यात कथालेखकाने आपल्या प्रिय वाचकांना लिहिलेली पत्रे काही वाचकांनी तर प्राणापलीकडे जपून ठेवली. त्याही पुढे जाऊन काहींनी ती पत्रं चंदनाच्या पेटीत ठेवली. त्या पत्रांना जीएंच्या आठवणींचा मधुर सुगंध आहे.

जीएंची पत्रे प्रदीर्घ असत. जीएंनी त्या काळात अनेक प्रसिद्ध साहित्यिकांना सुद्धा पत्रे लिहिली. जीएंनी श्री. पु. भागवत, सुनीता देशपांडे इ ना लिहिलेली पत्रे पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाली आहेत. तो आपल्यासारख्या वाचकांसाठी एक अनमोल ठेवाच आहे. अशाच महान साहित्यिक, विचारवंतांच्या पत्रांचा संग्रह ह वि मोटे यांनी करून तो पुस्तक रूपाने प्रसिद्ध केला. व. पु. काळे यांची पत्रे सुद्धा त्यांच्या चाहत्यांनी जपून ठेवली आहेत. वपुंची आगळीवेगळी भाषाशैली, आपले विचार मांडण्याची पद्धत यामुळे त्यांची पत्रे कधीही वाचली तर नुकतीच लिहिल्यासारखी ताजी वाटतात.

पत्रलेखनाच्या माध्यमातून अनेकांनी आपल्या मुलांना काही गोष्टी सांगितल्या,  हितगुज केले. पं नेहरूंनी तुरुंगात असताना इंदिरा गांधींना पत्रे लिहून भवतालच्या जगाची माहिती दिली. सुधारणा, राजकारण, इतिहास, धर्म इ बद्दल माहिती दिली. साने गुरुजींनी सुद्धा आपल्या छोट्या पुतणीला म्हणजे सुधाला पत्रे लिहून खूप गोष्टी समजावल्या आहेत. ती पत्रे ‘ साने गुरुजींची सुंदर पत्रे ‘ म्हणून प्रसिद्ध आहेत.

तर लोकहितवादी अर्थात गोपाळ हरी देशमुख यांच्यासारख्या समाजसुधारकाने पत्रासारख्या प्रभावी माध्यमाचा उपयोग समाजसुधारणेसाठी केला. ‘ प्रभाकर ‘ या साप्ताहिकातून त्यांची ही पत्रे प्रसिद्ध झाली. इतिहास, राजकारण, अर्थशास्त्र, परंपरा, धर्म जातीभेद, स्त्रीजीवन इ विषयांवर त्यांनी तब्बल १०८ पत्रे लिहिलीत. ही पत्रे ‘ शतपत्रे ‘ म्हणून प्रसिद्ध आहेत.

आज ही सगळी माहिती एवढ्याकरिता सांगितली की या पत्रांनी मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले आहे. ज्यांना अभिजात मराठी वाचायचे आहे, मराठीचा अभ्यास करायचा आहे, मराठीवर प्रभुत्व मिळवायचे आहे अशांनी जरूर ही पत्रे वाचावी. किमान ही पुस्तके चाळावी .

वर उल्लेखिलेली प्रसिद्ध पत्रे आहेत तसेच चांगदेवांनी ज्ञानेश्वरांना लिहिलेले पत्रसुद्धा प्रसिद्ध आहे. पण ते वेगळ्या कारणासाठी. योगी चांगदेवांना ज्ञानेश्वर महाराजांची योग्यता कळल्यावर एकदा त्यांच्या  मनात आले की आपण ज्ञानेश्वरांना पत्र लिहावे. पण सुरुवात कशी करावी हेच त्यांना उमजेना. ज्ञानेश्वरांना आशीर्वाद लिहावा, तर ते आपल्यापेक्षा ज्ञानाने मोठे. आणि नमस्कार लिहावा तर ते आपल्यापेक्षा वयाने लहान. म्हणून काहीच न लिहिता त्यांनी ज्ञानदेवांना कोरेच पत्र पाठवले.

खरं तर चांगदेव मोठे योगी, ज्ञानी आणि चौदाशे वर्षे वय असलेले. पण अध्यात्ममार्गात अहंकार सर्वात मोठा शत्रू असतो. सिद्धीच्या मागे लागल्यामुळे चांगदेवांमध्ये अहंकार शिरला. आणि ब्रह्मज्ञानापासून ते वंचित राहिले. म्हणून छोटी मुक्ताई म्हणाली, ‘ चांगदेव अजून पत्रासारखे कोरेच राहिले.’ आपणही हे सगळे समजून घेणार नसू तर आपणही तसेच कोरे राहू. ‘ मेरा जीवन कोरा कागज कोराही रह गया. ‘ अशी आपली गत नको व्हायला.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कप्पे… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

कप्पे☆ सौ कल्याणी केळकर बापट

अगदी लहानपणापासून आपल्याला काही गोष्टींच आकर्षण असतं. काही वस्तुंची, गोष्टींची संकल्पना आपल्या डोक्यात फीट बसलेली असते आपापल्या आवडीनुसार.

अगदी लहानपणी खेळतांना ति.सौ.आईची पर्स घेऊन मिरवायची खूप आवड.अगदी तेव्हा पर्स असं सुध्दा न म्हणता त्या वस्तू ला प्रस अस म्हंटल्या जायचं . त्या पर्समध्ये मला नेहमीच त्या पर्सच्या आकार, रंगापेक्षाही त्या पर्सला कप्पे म्हणजेच किती “खाणे”आहेत ह्याकडेच लक्ष असायचे.जितक्या जास्त कप्प्यांची पर्स तितकी ती जास्त आवडायची.

पुढे थोडे मोठे झाल्यावर घरोघरी गोदरेज ची कपाटं आलीतं.ही कपाटं तशी सर्रास नव्हती.अगदी घरटी एखादचं असायचं.ही लोखंडी कपाटं अगदी लोकल मेड असली तरीही त्या कपाटाला सगळे “गोदरेजचं कपाट” असचं म्हणायचे.माझ्या दृष्टीने ह्या कपाटातील कप्पे हेच आकर्षण केंद्र असायचं. ह्या कपाटात खालचे आणि वरचा एक असे मोकळेढाकळे , ऐसपैस,कप्पे होते. मधल्या भागात एक अगदी छोटसं लाँकर असायचं त्याचा वापर अगदी इटुकले पिटुकले किडुकमिडूक सोन्याचे बारीकसारीक डाग ठेवायला केल्या जायचा.

एक होतं तेव्हा माझं,तुझं असा काही शब्दचं नसायचा जे काही असायचं ते “आपलं”, सगळ्यांच सामायिक असायचं. त्यामुळे त्या एकाच कपाटात वेगवेगळ्या कप्प्यात अख्ख्या कुटूंबाचं जणू सर्वस्व एकवटलेलं असायचं.

काय नसायचं त्या कपाटात?  त्या कपाटात सगळ्यांचे ठेवणीतले कपडे, महत्वाचे दस्तावेज, घरातील सगळ्या हिशोबाच्या डाय-या,पैसे, ठेवणीतील फक्त पाहुणे अआले की बाहेर काढायच्या चादरी, क्राँकरी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ह्याच्याशी निगडित असलेल्या आठवणी.

ह्या कप्प्यांनी मात्र पुढील आयुष्यात खूप मोलाची गोष्ट शिकविली. ह्या कप्प्यांच महत्त्व च  वेगवेगळे. ह्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं स्थान वेगवेगळं. आपण ठरविलेल्या कप्प्यांमध्ये ठराविक जागीच ठराविक वस्तूचं महत्व योग्य. त्याची जर का स्थान,जागा सोडून सरमिसळ झाली तर सगळचं बिघडणारं.

तसचं अगदी मनात पण मी अनेक कप्पे तयार करुन त्याच्यात सरमिसळ होणार नाही ह्याची पुरेपूर काळजी घेण्याचं ठरविलं. प्रत्येक नात्याचा कप्पा वेगवेगळा, त्याच महत्व वेगवेगळं. त्यामुळे एखाद्या नात्यात बाधा निर्माण झाली तरी आपले बाकीचे नाते सावरायला असतात, किंवा आपणही एका नात्यासाठी बाकी नात्यांचं प्रेम काळजी ह्याने सक्षमपणे उभे राहू शकतो. मनाच्या ह्या कप्प्यांमध्ये रागाचा कप्पा मात्र अगदीच छोटासा आणि मागचा निवडला,फारसा न वापरल्या जाणारा,जास्त महत्व नसलेला.

प्रेमाचा,स्नेहाचा कप्पा मात्र मोठा आणि अगदी हाताला येईल असा ठेवला,वारंवार वापरात येणारा, कदाचित कुणावर चुकीने,गैरसमजाने आरोप केले असतील,आळ घेतले असतील तर दिलदारपणे खुल्यादिलाने माफी मागण्याचा कप्पा सदैव नजरेच्या टप्प्यात ठेवलायं,जेणेकरून कुणीही व्यक्ती विशेषतः निर्दोष व्यक्ती आपल्याकडून नकळत का होईना पण दुखावल्या जाणार नाही ह्या काळजीने.

अशा त-हेचे अनेक कप्पे मनात योग्य जागी तयार केलेत ज्यामुळं मनाला एक वेगळे समाधान लाभतं लाभतं हे नक्की.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print