मराठी साहित्य – विविधा ☆ “उपवास… आणि…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “उपवास… आणि…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

उपवास आपल्याला काही नवीन नाही. उपवास करण्याची अनेक कारणं, आणि प्रकार सुध्दा आहेत. अगदी ठराविक दिवशी, ठराविक वारी, ठराविक देवांच्या नावाने उपवास करण्याची किंवा तो सांगण्याची पध्दत आहे.

काही वेळा आपण उपवास करतो, काही वेळा तो घडतो, तर काहीवेळा मोडतो सुध्दा. कोणता उपवास कोणत्या पध्दतीने करायचा हे काही वेळा आपणच ठरवतो.

सकाळी उपवासाचे ठरलेले म्हणजे आपणच ठरवलेले पदार्थ खायचे व रात्री तो सोडायचा. सोडायचा म्हणजेच खायचे. उपवास करायचा तरी खायचे, आणि सोडायचा तरी खायचेच. फक्त या खाण्याच्या पध्दती आपल्या आणि आपल्या सोयीनुसार.

मग कोणी सकाळी उपवासाचे पदार्थ खातात, कोणी सकाळपासून रात्रीपर्यंत काहीच खात नाहित. कोणी फक्त फलाहार घेतात. तर कोणी फक्त द्रवपदार्थ. यात चहा, काॅफी, दूध, ताक, सरबत याच पोटभरेपर्यंत सेवन असत. पण असतो उपवास.

काही उपवास हे आठवड्यात, महिन्यात सातत्याने येतात, तर काही वर्षात एकदाच येतात. नवरात्रात करायचे वर्षात एकदाच पण सलग काही दिवस असतात. तर हरतालीका, वडपौर्णीमा या सारखे काही फक्त महिलाच करतात. यातही नवरात्रात केले जाणारे उपवास परत करणारा आपल्या पध्दतीने करतो. म्हणजे नवरात्र असे पर्यंत सकाळ संध्याकाळ उपवासाचेच खायचे. किंवा सकाळी उपवासाचे खायचे, व रात्री नेहमीचे. किंवा उपवासाच्या सगळ्या दिवसात रोज रात्री ठराविक पदार्थच जसे डाळ आणि दशमीच खायची.

यातही नेहमीच्या डाळ दशमीत लसूण, कांदा घातल्याशिवाय चव येत नाही अस म्हणत असलो तरी उपवास सोडतांना मात्र लसूण, कांदा खायचा नाही, कारण उपवास.

काहि धार्मिक कार्यक्रमात तर फक्त ते कार्य संपेपर्यंतच उपवास असतो, आणि मग नेहमीचे असले तरी खास जेवण. पण ते धार्मिक कार्य संपेपर्यंत मधल्या काळात खायचं ते उपवासाचच.

यात धार्मिक कार्याला हजेरी लावणारे उपवासाचे, व उपवासाला न चालणारे दोन्ही पदार्थ खातात. अस ऊपवासाबद्दल अनेक पध्दतीने सांगीतल तरी सगळा प्रकार खाण्याबद्दलच जाणवतो आणि खाण्याच्या बाबतीत थोडा गोंधळ उपवास न करणार्‍यांचा कदाचित होतो.

हे सगळ उपवास पुराण, उपवास, तो करण्याची पद्धत, वेेळ, वार, दिवस, खायला चालणाऱ्या किंवा लागणाऱ्या गोष्टी बर्‍याच आणि वेगळ्या आहेत. अशाच अनेक गोष्टी ऊपवास… आणि… या आणि नंतर जाणवल्या.

हे आणि म्हणजे दुसरं काहिही नाही. सध्या सुरु असणाऱ्या निवडणूकांच्या तयारीतली युती, महायुती, आघाडी, महाआघाडी, बंडखोरी, अपक्ष यांची चर्चा. ही युती, महायुती, आघाडी, महाआघाडी सुध्दा राष्ट्रीय पातळीवर वेगळी, स्थानिक पातळीवर वेगळी. काही ठिकाणी स्वबळाचा नारा, तर कुठे मैत्रीपूर्ण लढत. कुठे विरोधकांशीच हात मिळवणी. तर कुठे हातातला हात काढून घ्यायची तयारी. आम्हाला सत्ताच हवी अस काही नाही आम्ही विकासासाठी लढतो. अस म्हणतांना सगळ्या हालचाली असतात त्या सत्ता मिळवण्यासाठिच.

आमच्यात मतभेद असतील, पण मनभेद नाहीत. आमच्या समविचारी व्यक्तींसाठी आमचे दरवाजे उघडे आहेत अस म्हणतांना चर्चा मात्र बंद दाराआड. याच उघड्या ठेेवलेेल्या दाराने कोणी बाहेर जाणार नाही याचीही काळजी. आम्ही उमेदवारी देतांना राजकारण करणार नाही अस म्हणतांना उमेदवार मात्र राजकारण करणारा, करु शकणाराच लागतो. यात कस लागतो तो निष्ठावान असणारे, आणि निष्ठावान म्हणून घेणारे यांचा. यातले काही निवडून येतात, तर काही निवडून, निवडून आणावे लागतात. कुठे भावनिक साद घातली जाते, तर कुठे भावनेच्या आहारी जाऊ नका याचा नारा असतो. संघर्ष मिटवून एकत्र येण्याचा जल्लोष केला जातो, पण विभक्त होण्याची कारणं गुलदस्त्यातच राहतात.

अनेक वर्षांपासून आपसात संघर्ष असणारे रात्रीतून एकत्र येतात. तर घरोबा असणारे रात्रीतून बाहेर पडतात. हे सगळ सोयीनुसार, सोयीच्या ठिकाणी सोयीस्कर सुरु होत. उपवास करण्याच्या अनेक पध्दती असतील तशाच राजकारणाच्याही अनेक पध्दती आहेत अस म्हणाव लागेल.

अस आहे हे उपवास… आणि… राजकारण.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आयुष्य बदलणारा क्षण ओळखा” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “आयुष्य बदलणारा क्षण ओळखा☆ श्री जगदीश काबरे ☆

“कॅलेंडर नेहमी तारीख बदलत राहते, पण एक दिवस अशी तारीख येते जी कॅलेंडरच बदलून टाकते. म्हणून संयम ठेवा, प्रत्येकाची वेळ येणार असते.” ही ओळ केवळ प्रेरणादायी वाक्य नाही, तर मानवी जीवनाच्या सामाजिक आणि मानसिक गतीमानतेचे अत्यंत सूचक रूपक आहे. माणसाचे दैनंदिन जीवन हे सवयी, दिनक्रम, आणि पुनरावृत्ती यांमध्ये अडकलेले असते. प्रत्येक दिवस सारखाच वाटतो, परिस्थिती बदलत नाही असे भासते, आणि त्यामुळे निराशा किंवा हताशा निर्माण होण्याची शक्यता वाढते. पण इतिहास आणि समाजजीवन आपल्याला सतत दाखवत असते की, या सतत चालणाऱ्या “तारीख बदलण्याच्या” प्रक्रियेतच एखादा क्षण असा येतो, जो संपूर्ण प्रवाह बदलून टाकतो. हा बदल वैयक्तिक स्तरावरही असू शकतो—जसे एखाद्या व्यक्तीचे आयुष्य एका निर्णयामुळे पूर्णपणे बदलते किंवा सामाजिक स्तरावरही, जिथे एखादी घटना संपूर्ण समाजाच्या विचारसरणीत परिवर्तन घडवते. येथे मला मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनातील एका विविक्षित घटनेची आठवण होते. अजून ते महात्मा व्हायचे होते तेव्हाची गोष्ट आहे ही. गांधीजी दक्षिण आफ्रिकेत असताना एका खटल्यासाठी प्रिटोरियाला जात असताना डरबन रेल्वे स्टेशनवर एका गोऱ्या माणसाने गांधींकडे पहिल्या वर्गाचे तिकीट असूनही तो काळा माणूस आहे म्हणून त्यांच्या सामानासकट त्यांना प्लॅटफॉर्मवर धक्के मारून फेकले होते. तो क्षण गांधीजींच्या जीवनातला वळणबिंदू होता. कारण त्यानंतर त्यांनी इंग्रजांच्या विरोधात सत्याग्रहाचे हत्यार उपसून स्वातंत्र्याच्या लढ्यात झोकून दिले. हा क्षण म्हणजेच गांधीजींचा महात्मा होण्याचा क्षण होता. त्यांच्या जीवनात ती तारीख अशी होती की जिने कॅलेंडरच बदलून टाकले.

दुसरी गोष्ट अशी की, माणसाला जर यश मिळवायचे असेल तर त्याने संयम ठेवायची आवश्यकता असते. पण मानवी मन हे तात्काळ परिणामांची अपेक्षा ठेवते. मेहनत केल्यावर लगेच यश मिळावे, संघर्ष केल्यावर लगेच बदल दिसावा, अशी अपेक्षा असते. पण वास्तवात बदल हा संथ प्रक्रियेतून घडत असतो. ही संथता अनेकदा माणसाला खचवते, त्याचा आत्मविश्वास कमी करते. अशा वेळी “तुझीही वेळ येईल” हा आशावाद मनाला उभारी देतो. मात्र, या आशावादाची एक मर्यादाही आहे. केवळ वेळ येईल म्हणून निष्क्रिय राहणे, किंवा सर्व काही नशिबावर सोडणे, ही मानसिकता घातक ठरू शकते. तेव्हा संयम म्हणजे केवळ थांबणे नव्हे, तर सतत प्रयत्न करत राहण्याची तयारी आणि अपयशाला सामोरे जाण्याची ताकद होय.

समाजातील असमानतेमुळे अनेक लोक आर्थिक, शैक्षणिक किंवा सामाजिक कारणांमुळे मागे पडलेले असतात. त्यांच्यासाठी “एक दिवस येईल” ही कल्पना आशेचा किरण ठरते. पण दुसरीकडे, हीच कल्पना सत्ताधाऱ्यांकडून किंवा प्रभावशाली गटांकडून लोकांना शांत ठेवण्यासाठीही वापरली जाऊ शकते. “तुमची वेळ येईल” असे सांगून वर्तमानातील अन्याय, विषमता किंवा शोषण याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. त्यामुळे या वाक्याकडे अंध आशावाद म्हणून न पाहता, त्यामागील वास्तव समजून घेणे गरजेचे आहे.

शेवटी, हे वाक्य जीवनातील परिवर्तनाच्या शक्यतेवर विश्वास ठेवायला शिकवते, पण त्याचबरोबर तो बदल घडवण्यासाठी आवश्यक असलेल्या कृतीची जाणीवही करून देते.

थोडक्यात काय तर, कॅलेंडर बदलणारी तारीख आपोआप येत नाही; ती घडवावी लागते. म्हणूनच संयम आणि प्रयत्न यांचा समतोल साधणे हीच या विचाराची खरी किल्ली आहे.

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १५ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १५ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

गाथेतून दिसणारे संत तुकाराम

 भक्ती (३)

तुकारामांचे मन प्रपंचात, संसारात मुळीच रमत नाही. पांडुरंगाच्या भेटीची त्यांना तळमळ लागून राहिली आहे, म्हणूनच ते एकसारखे म्हणतात,

भेटी लागी जीवा लागलीसे आस

पाही रात्रंदिस वाट तुझी

परमेश्वर प्राप्तीच्या वेडाने

कन्या सासुरासी जाये। मागे परतुनी पाहे।

तैसे झाले माझ्या जीवा ।केव्हा भेटसी केशवा।।

 

जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. ।

तुकारामांची अवस्था पाण्याबाहेर तडफडणाऱ्या मासोळी सारखी झाली आहे. पांडुरंगाची कृपादृष्टी मिळवण्यासाठी आता काय करावे

हा एकच विचार त्यांच्या मनात रात्रंदिवस घोळत आहे.

ते पांडुरंगाला साद घालतात आणि म्हणतात,

तान्हेल्याची धनी फिटे गंगा नव्हे उणी।

माझे मनोरथसिद्धी पाव भावे कृपानिधी।।

तू तो उदारांचा राणा माझी अल्पशी ।

कृपादृष्टी पाहे तुका म्हणे होई साहे ।

एखाद्या तहानलेल्या माणसाने गंगेतले पाणी पिऊन त्याचे समाधान झाले, तरी गंगेचे पाणी काही कमी होत नाही. माणूस मात्र तृप्त होतो. त्याचप्रमाणे हे कृपेच्या सागरा माझ्या मनातल्या इच्छा, माझे सर्व मनोरथ तूच पूर्ण करू शकतोस.

तुम्ही माझ्याकडे कृपादृष्टीने पहावे एवढीच माझी अल्पशी इच्छा आहे. माझ्या साधनेत मला मदत करा.

भक्ती मार्ग हा परमेश्वरा प्रती जाण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. बहुतेक सर्व साधुसंत याच मार्गाने गेले आहेत, कारण या मार्गात कुठेही आड वळणे नाहीत. भक्ती मार्गाची ही वाट अगदी स्वच्छ आहे.

संत तुकारामही याच मार्गाने जात आहेत.

ते साधकांना सांगतात,

नव्हतो सावचित्त तेणे अंतरले हित।

पडिला नामाचा विसर वाढविला संसार।।

लटक्याचे पुरी गेलो वाहूनिया दूरी।

तुका म्हणे नाव आम्हा सापडला भाव।।

ते स्वतः विषयी सांगतात की हरी चिंतनाविषयी सावध नव्हतो, म्हणून विघ्ने आली. हरी नामाचा विसर पडला आणि संसार वाढवत बसलो. मायेच्या पुरात पुरता अडकलो. परंतु आता जागा झालो आहे. हरिभक्तीची नौका सापडली आहे.

तेव्हा आता काय उणे आम्हा विठोबाचे पायी

नाही ऐसे काही तेथे एक

तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावी

फुकाची लुटावी भांडारे ती

पांडुरंगाच्या गावाला मोक्षाची भांडारे भरलेली आहेत आणि भक्तांना ती अगदी मोफत आता लुटता येतात.

तुकाराम महाराज या मायामोहातून, प्रपंचातून मुक्त होऊन पांडुरंगाशी एकरूप होण्यासाठी पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणावर माथा ठेवण्यासाठी आतुर झाले आहेत. अतिशय व्याकुळ झाले आहेत. ते म्हणतात, ” पांडुरंगा तू मला फक्त भेट दे”. त्यासाठी…

नलगे हे तुझे ब्रह्मज्ञान। गोजिरे सगुण रूप पुरे।।

लागला उशिर।पतित पावन ।विसरूनी वचन। गेलास या।।

जाळूनी संसार। बसला अंगणी ।तुझे नाही मनी ।मानसी हे।।

तुका म्हणे नको राग रागेजू विठ्ठला। उठी पावतात देई मला भेटी आता।।

या अभंगातूनही विठ्ठलाच्या भेटीची तुकाराम महाराजांना लागलेली तळमळच दिसून येते. या अभंगात वापरलेला रागेजू हा शब्द मला विशेष लक्षणीय वाटला. लहान मूल जसे लडिवाळपणे त्याच्या मातेकडे काही हट्ट करते, त्याचप्रमाणे तुकाराम महाराज या माऊलीला रागावू नकोस असे मोठ्या लडिवाळपणे सांगत आहेत.

संसारातून तुकाराम महाराजांना पूर्ण विरक्ती आलेली आहे. पंचेंद्रियांवर ताबा मिळवलेला आहे, आणि ते पांडुरंगाला म्हणतात,

संसार हा तीही केला पाठमोरा

नाही द्रव्यदारा जया चित्ती

शुभाशुभ नाही हर्षामर्श अंगी

जनार्दन जगी होऊनी ठेला

तुका म्हणे दिला देह एकसरे

जयासी दुसरे नाही मग

त्यांना आता मान मरातब काही नको. त्यात त्यांना थोडेही सुख वाटत नाही. गोड अन्न सुद्धा त्यांना विष समान वाटत आहे. कोणी त्यांची स्तुती केली तर त्यांचा जीव कासावीस होतो.

ते म्हणतात,

नको मृगजळा होऊ मज

तुका म्हणे आता करी माझे हित

काढावे जळत्या आगीतून.

हा संसार म्हणजे त्यांना जळती आग वाटत आहे.

तुकाराम महाराजांच्या प्रत्येक शब्दातून त्यांची विठ्ठल भक्तीची आणि विठ्ठलाच्या भेटीची तळमळ दिसून येते

विठ्ठला रे तू उदाराचा राशी

विठ्ठला तुझं पाशी सकळसिद्धी

विठ्ठला रे तुझे नाम बहु गोड

विठ्ठला तू पुरविशी सर्व कोड

विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगले

विठ्ठला रे सोस घेतला जीवे

विठ्ठला रे शोक करीत असे तुका

विठ्ठला तू एका झडकरी

संत तुकाराम हे पूर्णपणे विठ्ठलमय झालेले आहेत.

क्रमशः… १५ 

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ९९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ९९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- “सोs टुमारो विल बी द लास्ट डे ऑफ युवर सर्विस लाइफ. विश यू ऑल द बेस्ट… “

“थँक्यू व्हेरी मच सर. थँक्स फॉर एव्हरीथिंग” माझा आवाज भरून आला होता.

माझा अनोखा भविष्यकाळ खऱ्या अर्थाने कृतार्थ करण्यासाठी माझ्या संपूर्ण आयुष्याला अतिशय रेखीव अशी सकारात्मक कलाटणी देणारी ती संध्याकाळ माझ्या उर्वरित आयुष्यासाठी एक नवी पहाटच ठरली होती!

आज पंचवीस वर्षे उलटून गेल्यानंतरही त्या संध्याकाळ पर्यंतचे हे असे सगळेच क्षण माझ्या मनात आपसूकच अलगद जपले गेलेयत! )

वखरेसाहेबांच्या केबिनमधून बाहेर येताना अनेक संमिश्र भावनांनी माझ्या मनात गर्दी केलेली होती. स्वतःच्याच केबिनमधे प्रवेश करतानाही या वास्तूच्या निरोपाचे क्षण हाकेच्या अंतरावर उभे असल्याच्या जाणिवेने माझं मन हळवं होऊन गेलं. अहमदनगर आणि अकोला इथल्या माझ्या अनपेक्षित बदल्या, तिथला माझा कसोटी पहाणारा कार्यकाळ आणि आजचा हा माझ्या उर्वरित आयुष्याची पुढची वाटचाल अतिशय सुकर करणारा अगदी आत्ता आत्तापर्यंत अनिश्चिततेच्या भोवऱ्यात भिरभिरत राहिलेला अनपेक्षित क्षण… सगळं स्वप्नवतच वाटत राहिलं!

आता उद्या आपला इथला अखेरचा दिवस. उद्याची मस्टरवरची आपली सही आणि दिवसभराची उपस्थिती हा केवळ एक उपचार होता. कारण या नोकरीच्या संदर्भातल्या सर्वच जबाबदाऱ्यांतून मी मनाने त्या क्षणीच मोकळा झालो होतो!!

अगदी कांही दिवसांपूर्वी या अशा क्षणाची मी कल्पनाही नव्हती केली. रोज बँकेतून बाहेर पडताना मनात दुसऱ्या दिवशी करण्याच्या अनेक कामांची व्यवधानं असायची. शरीर थकून गेलेलं असायचं. अतिशय वेगानं सातत्याने सुरू असलेलं तीस वर्षांपासूनचं हे चक्र अचानक दहा वर्षं आधीच असं थांबणार होतं आणि सोबत माझी जगण्याची उमेद वाढवणारं, मला मनापासून आनंद वाटेल असं कांहीही करण्याचं स्वातंत्र मला देणारं, दहा वर्षांचं आयुष्य बोनस म्हणून मिळणार होतं! हे असं सगळं उदार हस्ते माझ्या हवाली करताना जणू ‘तो’ मला ‘देता घेशील किती दोन करांने? ‘ असं विचारतोय असंच मला वाटत राहिलं. आज पंचवीस वर्षांनंतर त्या क्षणाकडे मागे वळून बघताना मला जाणवतं ते हेच कीं अट्टाहासाने, जीवाच्या कराराने कांही न करताही मला प्रत्येकवेळी जे हवं असायचं ते मी न मागता ‘तो’च देत आलाय. ‘तो’ सतत होताच माझ्याबरोबर. आणि मी मनापासून अगदी असोशीने समोर आलेल्या क्षणांना प्रेमाने हात लावताच त्या क्षणांचं सोनं झाल्याचा अलौकिक आनंद मला मिळत गेलाय.

या निवृत्तीनंतरच्या वाटचालीत ‘त्या’ने मला अतिशय मोलाचं असं बरंच कांही दिलंय. माझ्या लेखनाच्या बाबतीत बोलायचं तर त्या संदर्भात मनाच्या तळाशी सुप्तावस्थेत पडून राहिलेल्या माझ्या एका अव्यक्त इच्छेबद्दल मी आवर्जून सांगेन.

तोवरच्या पन्नाशीपर्यंतच्या माझ्या वाटचालीत मी माझ्या अगदी बालपणापासूनची लेखनाची आवड कथालेखनाच्या रुपाने प्रयत्नपूर्वक जपली असली तरी मला मनापासून आवडायचं ते नाटकच. तरीही कां कुणास ठाऊक पण नाट्यलेखन हे कथालेखनापेक्षा एक वेगळंच तंत्र आहे असंच मला वाटायचं आणि या धकाधकीच्या आयुष्यांत आपल्याला ते जमणं शक्यच नाही हे स्वीकारून मी आवडीने आणि सातत्याने आवर्जून नाटके पहात माझ्या मनातली दुधाची तहान ताकावर भागवत राहिलो होतो. हे ओळखून असल्यासारखं माझ्या मनात अव्यक्तपणे पडून राहिलेली नाट्यलेखनाची ती अतृप्त इच्छा पूर्ण व्हायचा योग माझ्या ध्यानीमनी नसताना अचानक एक दिवस ‘त्या’नेच जुळवून आणला. प्रसिद्ध नाटककार श्री. सुरेश खरे सरांनी २००५साली सांगलीत घेतलेल्या तीन दिवसीय नाट्यलेखन शिबीराचं निमित्त झालं. मी अंत:प्रेरणेने ते अॅटेण्ट केलं. खरेसरांशी ओळख झाली. त्या शिबिरातून सातारा, सांगली आणि कोल्हापूर या विभागातून सरांनी माझी ‘उदयोन्मुख नाटककार’ म्हणून निवड केली. आणि त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे मला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करतानाच संपूर्ण दोन अंकी नाटक लिहिण्यासाठी आवश्यक असा आत्मविश्वासही दिला. त्यांच्याच मार्गदर्शनानुसार मी वृद्धांच्या प्रश्नावरचे माझे ‘शेवटचे घरटे माझे’ हे पहिले नाटक लिहून पूर्ण केले, ‘नाट्यमंदार’ या व्यावसायिक नाट्यसंस्थेतर्फे त्याचे व्यावसायिक रंगभूमीवर शतकमहोत्सवी प्रयोगही झाले आणि नाट्यक्षेत्रात मला नवीन ओळख मिळाली! हे सगळं इतक्या सहज आणि झटपट घडत गेलं कीं आजही मला ते एखाद्या सुखद स्वप्नासारखंच वाटतं आणि म्हणूनच वास्तवातलं हे स्वप्न मला ‘त्या’नेच घडवलेला एक चमत्कारच वाटू लागतो! ‘त्या’नेच दिलेल्या सद्बुद्धीनुसार प्रसिद्धीच्या मागे लागून पैसे कमावण्याचा हव्यास न धरता, मी सांगलीत राहूनच हौशी रंगमंचासाठी सातत्याने नाट्यलेखन करू लागलो. यातून मिळत गेलेलं यश, नावलौकिक, जोडली गेलेली माणसे, नवनिर्मितीचं निखळ समाधान आणि बरंच कांही…! पैशात ज्याचं मोल होऊच शकणार नाही असं हे सगळं स्वप्नपूर्तीच्या आनंदासोबतच मला मिळत आलंय, जे ‘त्या’च्याकडूनच प्राप्त झालेल्या स्वेच्छानिवृत्तीच्या वरदानाअभावी कधीच शक्य नसतं झालं.

‌आयुष्य म्हणजे सुखांबरोबर दु:खंही आलीच. मीही त्याला अपवाद कसा असेन? म्हणूनच कदाचित स्वेच्छानिवृत्तीनंतर मोकळा श्वास घेण्यापूर्वीच मला अल्पकाळातच एका मागोमाग एक सामोरं जावं लागलेल्या अनेक दुःखद प्रसंगांच्या आठवणी माझ्या मनाच्या एका हळव्या कोपऱ्यात साठून राहिल्या आहेत!

या आठवणींमधले माझ्या स्वेच्छानिवृत्ती नंतर लगेचच्या पहिल्या एकदोन वर्षातच माझ्या आईला अनपेक्षितपणे आलेला पॅरॅलिसीसचा अॅटॅक आणि आरतीच्या भावाचं झालेलं लंग्ज कॅन्सरचं निदान हे प्रसंग त्या दोघांच्याही सहनशीलतेचा अंत पहाणारेच जसे तसेच दोन्हीकडच्या कुटुंबीयांचीही कसोटी पहाणारे होते. प्रदीर्घ संघर्षानंतर झालेल्या त्यांच्या मृत्यूने तर आम्हा सर्वांनाच मुळापासून हादरवून टाकलं होते हे खरंच, पण या दरम्यानच्या प्रत्येक क्षणी त्या दोघांच्याही स्वास्थ, उपचार आणि शुश्रुषा यासाठी दोन्ही घरच्या सर्वांकरता मी व्यक्तीश: पूर्णवेळ उपलब्ध राहू शकत होतो ते केवळ न् केवळ नोकरीतल्या पूर्णवेळच्या व्यवधानातून मी मुक्त झालो होतो म्हणूनच. त्यानंतरच्या सासूसासऱ्यांच्या वृध्दापकाळात त्यांच्या यातनामय परस्वाधीनतेतही मी प्रत्यक्ष आणि मनानेही त्यांना भावनिक आधार आणि सोबत देऊ शकलो याचं समाधान स्वेच्छानिवृत्तीमळेच मला मिळू शकलं होतं. आपल्या आयुष्यांत घडणाऱ्या अशा सर्वच घटना-प्रसंगांमागचं अचूक नियोजन ‘त्या’च्याशिवाय दुसरं कुणाचं असू शकतं? आपण कुणाच्याच नैसर्गिक सुखदु:खाचं निवारण प्रत्येकवेळी करू शकतोच असं नाही आणि दरवेळी इच्छा असूनही मदतीचा हात आणि सोबतही देऊ शकू असंही नाही हे खरंच. आणि तरीही ‘रुग्णावस्थेतल्या या माझ्या माणसांना आपुलकीची सोबत आणि मदतीचा हात देण्यासाठी ‘त्या’ने माझी निवड केली होती’ या विचाराच्या स्पर्शाने माझ्या माणसांचा क्लेशकारक वियोगही समतोल मनाने स्वीकारण्याचं बळ मला मिळालं होतं ही ‘त्या’चीच तर देन होती!!

स्वेच्छानिवृत्ती नंतर नवनवीन गोष्टी नियोजनपूर्वक मनापासून शिकण्याचा आनंदही मला घेता आला. काॅलेज जाॅईन करून पूर्ण केलेला गार्डनिंगचा कोर्स, ‘टॅक्स कन्सल्टन्सी’ चा सर्टिफिकेट कोर्स, नाट्यलेखन सुरू झाल्यानंतर त्या संदर्भातील अभ्यासासाठी पूर्ण केलेले नाट्यशास्त्राचे सर्टीफिकेट आणि डिप्लोमा हे अभ्यासक्रम आणि असं बरंच कांही. या सगळ्याच परीक्षांमधे मिळालेल्या विशेष प्राविण्यापेक्षाही मला मिळालेली योग्य दिशा आणि अनुभव मला महत्त्वाचे वाटतात. जाणीवपूर्वक आनंदाने जगणं यापेक्षा वेगळं काय असतं? हे सगळ्याचा ‘दाता’ तोच तर आहे.

‌तरीही ‘त्या’चं अस्तित्व मानणं किंवा नाकारणं हा वैयक्तिक दृष्टीकोनाचा किंवा स्वातंत्र्याचा भाग आहे हेही मान्य करायलाच हवं.

माझ्यापुरतं सांगायचं तर ‘त्या’च्या अस्तित्वाबद्दलचा विश्वास माझ्या नकळत्या वयापासूनच अशा अनेक घटना-प्रसंगांमुळेच माझ्या मनात माझ्याही नकळत आपसूक रूजत असतानाच पुढेही प्रत्येक पावलावर तो अधिकाधिक दृढच होत गेलेला आहे. माझ्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यातही पुढे असंख्य प्रसंगांमधे मला तीव्रतेने अनुभवास आलेला ‘त्या’चा अलौकिक स्पर्श माझं जगणं अर्थपूर्ण करतो आहे. त्या प्रत्येक प्रसंगाबद्दल सविस्तर लिहिणं विस्तारभयास्तव मी टाळायचं ठरवलं तरी त्यातले दोन अलौकिक अनुभव मात्र प्रातिनिधिक म्हणून मला आवर्जून सांगावासे वाटतायत!

 —–

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ – लोक काय म्हणतील..? – ☆ अलका ओमप्रकाश माळी ☆

अलका ओमप्रकाश माळी

?  विविधा ?

☆ – लोक काय म्हणतील..? – ☆ अलका ओमप्रकाश माळी ☆

कुछ तो लोग कहेंगे.. लोगों का काम है कहेना.. छोडो बेकार की बातों मे… बीत न जाये (रैना)… हे गाणं आजच्या विषयाला अगदी समर्पक आहे ना.. मनुष्य प्राणी समाजप्रिय आहे आणि ह्या समाजाचा मुख्य घटक म्हणजे लोक.. त्यामुळे आपल्या आयुष्यातील कित्येक निर्णय आपण लोक काय म्हणतील ह्याचा विचार करून घेत असतो.. पण हे कितपत योग्य आहे..? कोण आहेत हे लोक?

हे आपल्याला खरंच ओळखतात का?

– हे आपल्या संघर्षात सोबत होते का?

– हे आपलं सुख-दु:ख वाटून घेतात का?

हे तीन प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजेत अस मला वाटत.. आपले निर्णय जर लोक काय म्हणतील ह्यावर अवलंबून असतील तर ह्या प्रश्नांची उत्तर मात्र आपल्याकडे हवीत.. आणि ह्या प्रश्नांची उत्तर जर “नाही” अस असेल तर मग मात्र उडत गेले हे लोक म्हणाव आणि आपले निर्णय आपल्याला हवेत तसे घ्यावेत..

“लोक काय म्हणतील? ” हा प्रश्न आपल्याला अडवत असेल, तर हे लक्षात ठेवलं पाहिजे –

‘आपलं आयुष्य, आपले निर्णय, आपली जबाबदारी! ’

लोकांचं मत हा एक ट्रेंड आहे – ते दर मिनिटाला बदलतं.

पण आपल्या निर्णयाचा परिणाम आपल्यावर होतो – त्यामुळे जो भी करेंगे आपने लिये करेंगें.. मग जो होगा देखा जाएगा.. कोणताही निर्णय घेताना लोकांचा विचार करण्यापेक्षा आपल्या निर्णयांचे आपल्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहेत हे महत्वाचं असत.. लोकांच काय आहे उद्या लोक तेराव्याच जेवायला आल्यावर ही ऊन जास्त आहे मसाला ताक हव होत यार हे ही बोलून दाखवतील.. त्यामुळे लोगोको मारो गोली और मस्त जियो..

अपना हर दिन ऐसे जियो

जैसे कि आखिरी हो..

अस गाणं गुणगुणत मस्त आयुष्य जगायचं.. शेवटी काय जिंदगी एक पहेली है सुलझावो तो सुलझेगी और उलझावो तो उलझेगी.. म्हणून लोगोंका काम है कहेना म्हणायच आणि चालत रहायचं.. फारच लोक मागे लागले तर आपण पाठमोर होऊन एक झक्कास सेल्फी घ्यायची की मग सगळे आपल्याकडे बघतात आणि खुशी खुशी हसतात.. सो चला तर जलने वालोंको और जलाओ और खुद जी भर के जियो…

अपनी लाइफ अपने रूल..

बाकी सबको जाओ भूल..

 

© अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वस्तू वस्तू जपून ठेव – ५ – टिक टिक -☆ विभावरी कुलकर्णी ☆

विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ वस्तू वस्तू जपून ठेव – ५ – टिक टिक – ☆ विभावरी कुलकर्णी

सध्या लहानमुलांसाठी खूप आकर्षक म्हणजे अगदी मोठ्या माणसांना सुद्धा भुरळ पडावी अशी खेळणी दिसून येतात. ती खूप महाग पण असतात. काही खेळणी ज्ञान वाढवणारी असतात. परंतु साधारण चाळीस वर्षांपूर्वी एक लोकप्रिय असलेले खेळणे मला आठवते. त्याची किंमत असेल दहा किंवा पंधरा पैसे. पण मुलांच्या दृष्टीने उपयुक्त! त्याचे नाव टिक टिक किंवा टीन क्लिकर

 ​या वस्तूला ‘कडकडी’ सुद्धा म्हटले जाते. इंग्रजीत याला ‘Metal Clicker’ किंवा ‘Cricket’ असेही नाव आहे. ​खेळणी म्हणून: ८० च्या दशकातील मुलांचे हे सर्वात आवडते आणि स्वस्त खेळणे होते. अंगठ्याने तो धातूचा पत्रा दाबला की ‘कडक’ असा आवाज येतो, म्हणून मुले याचा वापर गंमत म्हणून किंवा एकमेकांना खुणावण्यासाठी करत असत.

​फार कमी लोकांना माहीत आहे की, अशा प्रकारच्या क्लिकरचा वापर दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन सैनिकांद्वारे (विशेषतः पॅराट्रूपर्स) रात्रीच्या वेळी अंधारात एकमेकांना सांकेतिक संदेश देण्यासाठी केला जात असे. एकदा ‘क्लिक’ केल्यास उत्तर म्हणून दोनदा ‘क्लिक-क्लिक’ करणे, ही त्यांची ओळख पटवण्याची पद्धत होती.

निर्मिती

​हे खेळणे लवचिक स्प्रिंग स्टील (Spring Steel) किंवा कथील (Tin) च्या पातळ पत्र्यापासून बनवले जाते.

​एका छोट्या धातूच्या चौकटीत किंवा डबीत हा पत्रा अशा प्रकारे बसवलेला असतो की तो थोडा फुगीर राहतो.

​ जेव्हा आपण या पत्र्यावर दाब देतो, तेव्हा तो आपला आकार बदलतो आणि पुन्हा मूळ स्थितीत येताना हवेच्या दाबामुळे एक विशिष्ट ‘टीक’ आवाज निर्माण होतो. सुरुवातीला हे अगदी साधे पत्र्याचे असायचे. कधीकधी तो पुढचा पातळ पत्रा हाताला लागायचा. किंवा ते खिशात ठेवले की पत्र्याच्या टोकामुळे खिशाला छिद्र पडायचे. पण कोणालाही कळू न देता मित्रांना संकेत द्यायला उपयोगी होते.

मुले फक्त मजेसाठी हा आवाज काढत असत.

​खेळताना (उदा. लपाछपी किंवा पकडापकडी) एकमेकांना दूरून संकेत देण्यासाठी किंवा बोलावण्यासाठी याचा वापर व्हायचा.

​ गाणी म्हणताना किंवा ठेक्यावर वाजवण्यासाठी मुले याचा वापर करत.

​ काही मुले हे आपल्या सायकलच्या हँडलला लावून बेलसारखा वापर करायची.

नंतर या साध्या दिसणाऱ्या टिकटिकला आकर्षक रंग लावून किंवा काही प्राण्यांचे आकार देऊन रंगीबेरंगी करुन आकर्षक केले गेले.

याच्या आवाजाच्या मदतीने कुत्र्यांना प्रशिक्षण दिले जात होते.

​हे खेळणे आता दुर्मिळ झाले असले तरी, आजही जत्रेत किंवा जुन्या वस्तूंच्या दुकानात पाहायला मिळते.

© विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मनकवडा राम… आत्माराम… ☆ अपर्णा परांजपे ☆

अपर्णा परांजपे

🌳 विविधा 🌳

☆ ✍️ मनकवडा राम… आत्माराम… ☆ अपर्णा परांजपे

ब्रह्म वाक्य आहे हे असं जर मी म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही याची खात्री आहे!

मुळात हे आत्मचिंतन असल्याने स्व वर केंद्रित आहे. बुद्धी ही दोन प्रकारची आहे.

१ देहबुद्धी (अज्ञान, मर्यादित बुद्धी)

२: आत्मबुध्दी (ज्ञान, अंतिम सत्य)

मग पहिला स्व जाणणारी बुध्दी समजून उमजून बदलवून दुसऱ्या स्व मध्ये प्रतिष्ठित करणे सोपं कसं असेल? म्हणून सगळा गोंधळ, अस्वस्थता, अस्पष्टता असते हे खरे, हे “जीवाचे” लक्षण आहे. पण

जीव जीवच राहून सुखी झाला असता तर सगळे प्रश्न मिटले असते. मर्यादित रुप हे अमर्याद स्वरूपाचा अंश असल्याने त्याची तळमळ शांत होत नाही व खरे समाधान मिळत नाही, जोपर्यंत तो स्वतः अमर्याद होत नाही. हाच अमर्याद स्व म्हणजे दुसरा स्व!

दुसरा स्व ही आपणच आहोत फक्त पहिला स्व ओळखून नव्या स्व ची ओळख धारण करणे ही ” घटना घडणे” म्हणजे खरा चमत्कार आहे.

देह रूपाने जन्म मिळाला हाही चमत्कारच आहे पण तो दृश्य आहे. या देहाचा आधार, चैतन्य म्हणजे आत्मा त्या आत्म्याचे स्वरूप परमात्म्याचा अंश आहे, हे जाणवणे म्हणजे “जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा” या महावाक्याचा स्वानंद अनुभवणे आहे! म्हणून हा खरा “दैवी चमत्कार” आहे!

मर्यादित रुपात स्वतः प्रतिष्ठित झालेला आत्माराम ओळखण्यासाठी त्याचीच माया अडथळा करते, परीक्षा घेते, जे आवश्यक आहे सगळे मनाचे खेळ उघड करते व मनाला स्व कडे वळवते. जीवनानुभव घेत घेत, सत्संग, सत्संगती, सद्ग्रंथ सापडणे ही सद्गुरू कृपा आहे. मार्गदर्शन मिळाल्याशिवाय मार्ग कळणार कसा?

 वेगवेगळ्या पध्दतीने दुसऱ्या स्व ची ओळख व्हावी असा प्रयत्न स्वतः सद्गूरु करतात हीच त्यांची कृपा आहे. आत्मनिष्ठ सद्गूरु च आत्म्याची ओळख करून देतात. मग मर्यादित स्व अमर्याद स्व मध्ये परिवर्तित होतो. महादेव हे देवांचे देव आहेत. त्याच्या मुखातून आलेली कथा पार्वती मातेसोबत शुकाने श्रवण केली व अमरत्व प्राप्त झाले. अश्या गोष्टी जीवनाचा आधार ठरतात.

रामाशिवाय शिव नाहीत

शिवाशिवाय राम नाहीत…

भगवान शंकरांचे जीवन बघितले तर..

भगवान शंकरांना ‘देवाधिदेव’ महादेव म्हटले जाते. महादेवांचे एक रूप तांडव करणाऱ्या ‘नटराजा’चे आहे, तर दुसरे रूप एका महान ‘महायोगी’चे आहे. ही दोन्ही रूपे रहस्यांनी भरलेली आहेत. शिवशंभूंना ‘भोलेनाथ’ असेही म्हणतात. जिथे एकाच व्यक्तिमत्त्वात इतके विविध पैलू आहेत, तिथून आपण आपल्या जीवनासाठी प्रेरणा नक्कीच घेऊ शकतो.

वाईटाचा नाश करणे

ब्रह्मा हे उत्पत्तीसाठी आणि विष्णू हे सृष्टीच्या रचनेसाठी ओळखले जातात, तर शिव हे विनाशासाठी ओळखले जातात. शिवाचे हे रूप कदाचित भीतीदायक वाटू शकते, परंतु प्रगतीसाठी एखाद्या वाईट गोष्टीचा किंवा अनिष्ट प्रथांचा नाश होणे अत्यंत आवश्यक असते. शिव याच परिवर्तनासाठी ओळखले जातात.

शांत राहून स्वतःवर नियंत्रण मिळवणे

शिवापेक्षा मोठा कोणीही योगी झालेला नाही. एखाद्या परिस्थितीत स्वतःला गुंतवून न घेता, अलिप्त राहून त्या परिस्थितीवर पकड ठेवणे सोपे नसते. महादेव एकदा ध्यानाला बसले की संपूर्ण जग इकडे-तिकडे झाले तरी त्यांचे ध्यान कोणीही भंग करू शकत नाही. शिवाचे हे एकाग्र रूप आपल्याला जीवनातील गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यास शिकवते.

नकारात्मक गोष्टींना सकारात्मकतेने स्वीकारणे

समुद्रमंथनातून जेव्हा विष बाहेर आले, तेव्हा ते पिण्याची कोणाचीही तयारी नव्हती. अशा वेळी महादेवांनी स्वतः ते विष (हलाहल) प्राशन केले आणि त्यांना ‘नीलकंठ’ हे नाव मिळाले. या घटनेतून हा मोठा धडा मिळतो की, आपणही जीवनातील नकारात्मक गोष्टी पचवून घ्याव्यात, पण त्याचा परिणाम ना स्वतःवर होऊ द्यावा, ना इतरांवर.

जोडीदाराबद्दल आदर

हिंदू मान्यतेनुसार महादेव हे एक आदर्श जोडीदार मानले जातात. जर पार्वतीने त्यांना प्राप्त करण्यासाठी वर्षानुवर्षे तपश्चर्या केली, तर शिवानेही त्यांना आपली ‘अर्धांगिनी’ बनवून पूर्ण सन्मान दिला. म्हणूनच ३३ कोटी देवांमध्ये केवळ शिवांनाच ‘अर्धनारीश्वर’ म्हटले जाते.

सदैव समान भाव ठेवणे

शिवाचे संपूर्ण रूप पाहिले तर असा संदेश मिळतो की, ज्या गोष्टी आपण साध्या डोळ्यांनी पाहणेही टाळतो, त्या त्यांनी सहज स्वीकारल्या आहेत. म्हणूनच त्यांच्या लग्नाला भूतांची टोळी आली होती आणि अंगाला राख लावलेल्या भोळ्यानाथांच्या गळ्यात साप लटकलेला असतो. वाईट कशातच नसते, फक्त एकदा तुम्हाला ते स्वीकारता आले पाहिजे.

 तिसरा डोळा उघडणे

शिवांना ‘त्र्यंबक’ म्हटले जाते कारण त्यांना तिसरा डोळा आहे. तिसरा डोळा म्हणजे बोध किंवा अनुभूतीचा एक वेगळा आयाम (Dimension) खुला होणे. दोन डोळे फक्त भौतिक जग पाहू शकतात, पण तिसरा डोळा अंतर्मनात पाहतो. या ज्ञानामुळे तुम्ही जीवनाकडे पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकता. त्यामुळे कोणत्याही ठरवलेल्या वाटेवर चालण्यापूर्वी स्वतः विचार करा आणि गोष्टी समजून घ्या.  

स्वतःचा मार्ग स्वतः निवडणे

शिवांची जीवनशैली असो वा त्यांचे कोणतेही अवतार, ते प्रत्येक रूपात पूर्णपणे वेगळे आहेत. मग ते तांडव करणारे नटराज असोत, विष प्राशन करणारे नीलकंठ असोत, अर्धनारीश्वर असोत किंवा लवकर प्रसन्न होणारे भोलेनाथ असोत. ते प्रत्येक रूपात जीवनाला एक योग्य दिशा दाखवतात.  

आपली ग्रंथसंपदा अथांग आहे! त्यातील एखादा कण जरी वेचता आला व त्याची प्रचिती घेण्यासाठी बुद्धी चा निश्चय झाला व तसे आचरण करता आले तर आणि तरच मानवी जीवनाचे कल्याण आहे म्हणून च चिंतन केले

मनकवडा राम… आत्माराम त्याचच खरा आधार व साक्षीदार ही तोच!

जे घडतंय व घडेल ते त्याच्या कृपेने घडणार तर मायिक शब्दांना काय स्थान?

भगवंत हृदयस्थ आहे 🙏

कृतज्ञ मी कृतार्थ मी 🙏

©  अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “श्रद्धा आणि विश्वास” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “श्रद्धा आणि विश्वास☆ श्री जगदीश काबरे ☆

“श्रद्धा” आणि “विश्वास” हे शब्द रोजच्या बोलण्यात अनेकदा परस्परांना पूरक म्हणून वापरले जातात; परंतु त्यांच्या आशयात मूलभूत फरक आहे. भाषाशास्त्रीय आणि तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर “विश्वास” हा प्रामुख्याने अनुभव, पुरावा, तर्क आणि पुनर्परीक्षण यांवर आधारलेला असतो; तर “श्रद्धा” ही भावनिक, सांस्कृतिक किंवा धार्मिक संदर्भातून निर्माण झालेली अंतर्मनाची बांधिलकी असते. विश्वास हा एखाद्या विधानाबद्दलचा स्वीकार असतो, जो उपलब्ध माहितीवर उभा असतो. उदाहरणार्थ, सूर्य पूर्वेकडूनच उगवतो हा विश्वास आपण पूर्वानुभव आणि वैज्ञानिक स्पष्टीकरणांवरून ठेवतो. परंतु एखाद्या देवतेवर, गुरुवर किंवा ग्रंथावर असलेली निष्ठा (येथे बरेचदा लोक विश्वास हा शब्द वापरतात) ही बहुधा श्रद्धेच्या चौकटीत येते; ती अनुभवापेक्षा परंपरेवर आणि भावनिक नात्यावर अधिक आधारित असते.

विश्वासाचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे त्याची परिवर्तनीयता. एखादी गोष्ट खरी आहे असे आपण मानतो; परंतु नवे पुरावे, संशोधन किंवा अनुभव आपल्याला दाखवतात की ती गोष्ट चुकीची आहे, तर आपला विश्वास बदलतो. विज्ञानाचा संपूर्ण प्रवास याच तत्वावर उभा आहे. विज्ञानात कोणताही सिद्धांत अंतिम नसतो; तो नव्या प्रयोगांनी, नव्या माहितीने तपासला जातो. म्हणूनच विश्वास हा परिवर्तनीय असतो… तो वाढतो, बदलतो, कधी मोडतो, तर कधी अधिक बळकट होतो. ज्यावर आपला विश्वास आहे त्याला प्रश्न विचारणे हा त्याचा अपमान नसतो; उलट ती त्याची शक्ती असते. कारण प्रश्नांच्या कसोटीवर टिकणारा विश्वासच खरा ठरतो.

याच्या उलट श्रद्धेचे स्वरूप बहुतेकदा अपरिवर्तनीय असते. अनेक धर्मसंस्थांमध्ये किंवा परंपरांमध्ये श्रद्धेची चिकित्सा करणे म्हणजे पाप किंवा अवमान मानला जातो. परिणामी श्रद्धेला प्रश्न विचारण्याची मुभा नसते. ती तपासली जाऊ नये, बदलली जाऊ नये, अशी मानसिक चौकट तयार केली जाते. अशा वातावरणात श्रद्धा ही स्थिर, अपरिवर्तनीय आणि अंध स्वरूप धारण करते. श्रद्धेचा पाया भावनिक असतो; म्हणून ती तर्काच्या कसोटीवर टिकली नाही तरी टिकवून धरली जाते. एखादी गोष्ट चुकीची आहे हे कळूनही “माझी श्रद्धा आहे” या कारणाने ती सोडली जात नाही. म्हणूनच विश्वास आणि श्रद्धा यांतील मुख्य भेद म्हणजे बदल स्वीकारण्याची तयारी आहे की नाही हा आहे. विश्वास हा सत्याच्या शोधात असतो. तो सत्य सापडल्यावर आपले रूप बदलतो. श्रद्धा मात्र सत्यापेक्षा स्थैर्याला महत्त्व देते. विश्वास म्हणतो, “मला पटते, पण जर चुकीचे ठरले तर मी बदलेन. ” श्रद्धा म्हणते, “मला पटते, आणि तेच अंतिम आहे. ” या दोन भूमिकांतील फरक लक्षात घेतला तर समाजातील अनेक वादांची मुळे स्पष्ट होतात.

याचा अर्थ श्रद्धा नेहमीच नकारात्मक असते असे नाही. ती व्यक्तीला मानसिक आधार, प्रेरणा आणि धैर्य देऊ शकते. पण जेव्हा श्रद्धेला प्रश्नांपासून दूर ठेवले जाते, तेव्हा ती विचारस्वातंत्र्यावर मर्यादा आणते. म्हणूनच मी असे नेहमी म्हणतो की, ज्या श्रद्धा चिकित्सेला नकार देतात त्या सगळ्या अंधश्रद्धाच असतात. सर्वसाधारणपणे प्रत्येक वेळेला असे निदर्शनास आलेले आहे की, कोणत्याही धर्मातील श्रद्धा ही चिकित्सेला नकारच देत असते म्हणून प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते. विश्वास मात्र व्यक्तीला संशय, शोध आणि आत्मपरीक्षणाची सवय लावतो. म्हणूनच विचारशील समाज घडवायचा असेल, तर विश्वासाच्या परिवर्तनीय स्वभावाला मान्यता देणे आणि श्रद्धेलाही प्रश्नांच्या प्रकाशात पाहण्याची तयारी ठेवणे आवश्यक आहे. श्रद्धा आणि विश्वास यांचा हा सूक्ष्म पण मूलभूत फरक ओळखला, तर वैचारिक प्रगल्भतेकडे एक मोठे पाऊल टाकता येईल.

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भगिनी निवेदिता ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

? विविधा ?

☆ भगिनी निवेदिता ☆ शालिनी जोशी

भगिनी निवेदिता

 जी स्वतःचा उल्लेख ‘ रामकृष्ण- विवेकानंद यांची निवेदिता’ असा करत असे, ती स्वामी विवेकानंदांची मानस कन्या म्हणजे मार्गारेट एलिझाबेथ नोबल. यांचा जन्म २८ ऑक्टोबर १८६७ रोजी उत्तर आयर्लंड मध्ये झाला. वडील सॅम्युएल आणि आई मेरी यांचे हे पहिले अपत्य. कुटुंब धार्मिक, सात्विक व सुशील होते. मेरी नोबेलने इतर अनेक धर्मशील स्त्रियांप्रमाणे मनात प्रार्थना केली होती, ‘ ईश्वरा, माझं बाळ सुखरूप जन्माला आलं तर तुला अर्पण करीन’. ती प्रतिज्ञा खरी ठरली. मार्गारेटने आपले जीवन भारतीय समाजाच्या सेवेसाठी अर्पण केले. आपले सद्गुरु विवेकानंद यांचे कडून निवेदिता म्हणजे ‘जीवन समर्पित केले आहे अशी’ हे अभिधान प्राप्त केले.

 मार्गारेट यांचे प्राथमिक शिक्षण मँचेस्टर येथे झाले. वडिलांच्या निधनानंतर लंडन येथे शिक्षिका म्हणून काम करू लागल्या. हसतहसत बालशिक्षण या शिक्षण पद्धतीचा सखोल अभ्यास करून १८९२ मध्ये नव्या शिक्षण पद्धतीने शिक्षण देणारी शाळा सुरू केली. १८९४ मध्ये क्रांतिकारकानी स्थापन केलेल्या सिनफेन या पक्षाचे सदस्यत्व स्विकारले. १८९३ च्या सर्वधर्म परिषदेनंतर विवेकानंदांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. १८९६ मध्ये लंडन येथे विवेकानंदांची व्याख्याने त्यांनी ऐकली. त्यांना सद्गुरु मिळाले. स्वामी विवेकानंदांच्या कार्यात भाग घेण्यासाठी १८९८ मध्ये निवेदिता भारतात आल्या.

 भारतात त्या कलकत्ता येथे राहिल्या. हिंदू चालीरीती परंपरा समजावून घेतल्या. रामकृष्ण परमहंसांच्या पत्नी शारदादेवी यांची भेट घेतली. हिंदू धर्म स्वीकारला. हिंदुस्थान हेच कार्यक्षेत्र निश्चित केले. १८९८ मध्ये ब्रह्मवादीनी व्रताची दीक्षा घेतली. इंग्लंडकडून भारताला मिळालेली अमोल देणगी, असा विवेकानंद निवेदिताचा उल्लेख करत. हिंदू पुराणांचा व ग्रंथांचा अभ्यास निवेदिताने केला. विवेकानंदांच्या बरोबर सर्वत्र त्या जात. १८९८ मध्ये आलेल्या प्लेगच्या साथीत स्वामीजी व इतर शिष्यांबरोबर रोगग्रस्तांची सेवा त्यांनी केली. स्वच्छता केली व त्याचे महत्त्व लोकांना पटवून दिले. वेदांतील निष्काम कर्मयोग आचरणात आणला. बंगालच्या दुष्काळात लोकांना मदत केली. बालिका विद्यालय सुरू केले. त्याचे उद्घाटन शारदा देवीनी केले. बालविवाहित व अनाथ स्त्रियांना स्वावलंबी बनवण्यासाठी घरगुती उद्योगांबरोबर आणि भूगोल, इतिहास, गणित हे विषय शिकवले. जेणेकरून स्त्रिया सर्व अंगानी कर्तबगार व्हाव्या. बालिका विद्यालयातील तीन मुलींची संख्या ३० झाली. स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यासाठी मातृमंदिराची स्थापना केली. व्याख्याने, लेखन करून सत् मार्गाने मिळवलेला पैसा या कार्यात खर्च केला. मी हिंदू आणि सर्व स्त्रिया माझ्या मुली हा त्यांचा भाव होता. गरजवंताला मदत हे ध्येय होते. त्यामुळे लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला. त्या सर्वांच्या भगिनी झाल्या.

 स्वातंत्र्य चळवळीतही त्यानी सहभाग घेतला. हे रामकृष्ण मिशनच्या विचाराविरुद्ध होते म्हणून काही काळ ते काम थांबवले. लेखन, भाषण द्वारे स्वदेशी चळवळीत सक्रिय भाग घेतला. स्वामी विवेकानंद यांच्या निधनानंतर त्यांचा कसोटीचा काय होता. पण हाती घेतलेले काम सुरू ठेवण्याचा त्यांनी निश्चय केला. बंगालच्या विभाजनाला इंग्रजांना निषेध केला. अशीही अद्वितीय प्रतिभावंत स्त्री विवेकानंदांच्या परिश्रमाने भारतीयत्वात पूर्ण विलीन झाली. मी विवेकानंदांची मानसकन्या जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांची विस्मृती लोकांना होऊ देणार नाही. असा पण त्यांनी केला होता. निवेदितांचे जहाल विचार, ब्रिटिश सरकार विरुद्धच्या हालचाली, युवकांच्या मनात स्वातंत्र्याबद्दल आस निर्माण करणे या कार्यामुळे ब्रिटिश गुप्तहेरांची पाळत त्यांच्यावरती राहू लागली होती. युवकांसमोर आपल्या राष्ट्राचे चिन्ह असावे या भावनेने वज्राचे चिन्ह असलेला ध्वज तयार केला. तरुणांनी परदेशी जाऊन प्रशिक्षण घ्यावे ही कल्पना मांडली व अमलात आणली. परदेशातील क्रांतिकारी चळवळीची ग्रंथसंपदा भारतीय तरुणांना मिळवून दिली. जगदीशचंद्र बसू (वनस्पती शास्त्रज्ञ), रवींद्रनाथ टागोर, त्यांचे बंधू अवनीन्द्रनाथ, अरविंद घोष, बंगाली इतिहासतज्ञ रमेशचंद्र दत्त या सर्वांशी त्यांचे संबंध चांगले होते. त्यांनी बरेच ग्रंथ व लेख लिहिले. हिंदू संस्कृती आणि समाज पद्धती याविषयीचा त्यांचा ग्रंथ गाजला.

 १३ ऑक्टोबर १९११ रोजी त्यांनी इहलोकाचा प्रवास संपवला. त्यांचे अखेरचे वाक्य होते, ‘ मी आता चालले तरी भारतात ध्येयसूर्याचा उदय मी पाहिनच पाहिन. ‘ त्यांचे कार्य आणि शेवटचे वाक्य युवकांना प्रेरणादायी असेच आहे.

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १४ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १४ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

परमेश्वराशी तादात्म्यता-१

मागील भागात स्वतः तुकाराम महाराज निःसंग होऊन लोकांनाही भवभया पासून मुक्त होण्यासाठी कसे सावध करीत होते हे आपण पाहिले. एकदा जीवनात निःसंगता आली की द्वैतभाव नष्ट होऊन परमेश्वराशी तादात्म्यता कशी येते याविषयी गाथेतील काही अभंग घेऊन आपण या भागात विवेचन करूया.

शरणागत भक्तांना तुकाराम महाराज काय सांगत आहेत?

ब्रह्मादीक जया लाभासी ठेंगणे/

बाळीये आम्ही भले शरणागत//१//

ते भक्तांविषयी आणि स्वतः विषयी बोलत आहेत. ब्रह्मादीकांना सुद्धा जो लाभ होऊ शकत नाही, ते त्यासाठी ठेंगणे, तोकडे पडतात तो लाभ देवाला शरण आलेल्या आम्हा भक्तांना अगदी सहज होतो. त्याचे कारण काय? तर

 कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ/

 झाला पद्मनाभ सेवाऋणी//२//

आम्ही कामना, वासनांचा त्याग केल्यामुळे आम्हाला भजनाचा लाभ झाला आहे आणि आमच्याकडून होणाऱ्या या सेवेसाठी प्रत्यक्ष विष्णू सुद्धा आमचा ऋणी झाला आहे.

परमेश्वराला प्रसन्न करण्याचे भजन हे फार प्रभावी साधन आहे.

 कामधेनुच्या क्षीरा पार नाही/

 इच्छितचिये वाही वरुसावे//३//

या ठिकाणी महाराजांनी कामधेनूचे रूपक वापरले आहे. कामधेनूचे दूध कधीही न आट णारे असते. या सर्व संत मंडळींची हरी म्हणजे कामधेनू आहे. जेवढ्या आमच्या हरिभक्तीचा जोर मोठा तेवढा या धेनूचा पान्हा सकस आणि सरस!

 हरी नाही आम्हा विष्णुदासा जगी/

 नारायण अंगी विसावला//४//

आम्हाला बसल्या जागी परिपूर्णत्व आले आहे. आता आमच्या ठिकाणी ध्याता, ध्यान, आणि ध्येय असा भेद राहिला नाही. नारायण आमच्या अंगी विसावला आहे अर्थात आम्ही अद्वितीय ब्रह्मरूप झालो आहोत.

 शेवटी याच अभंगात महाराज सांगतात,

 तुका करी जागा/ नको वासपू वाउगा/

 आहेस तू अंगा/ अंगी डोळे उघडी//५//

प्रत्यक्ष भगवंत हृदयात स्थिर झाल्यामुळे, नारायणमय झाल्यामुळे आम्ही भक्तजन अत्या- नंदाच्या भोजनाचा आस्वाद घेत आहोत. वासनाक्षयामुळे आम्हाला पुनर्जन्म नाही. नारायण स्वरूपाशी तादात्म्यभाव हे या अवस्थेचे रूप आहे.

निजरूप विसरून तुकाराम महाराज झोपी गेलेल्याला जागे करतात. त्याला सांगतात की तू भिऊ नकोस. अद्वैतरूपी हरी तुला सापडेल कारण तू स्वतःच अंगाने तो आहेस, परमात्मा रूप आहेस. जेव्हा तू तुझी आत्मिकदृष्टी उघडून पाहशील तेव्हा तुला त्याचे ज्ञान होईल.

एकात्मतेचे दुसरे उदाहरण या अभंगातून पहा.

 माया तेची ब्रह्म ब्रह्मतेची माया/

 अंग आणि छाया जया परी//

आपले शरीर आणि सावली ही जशी वेगळी नसतात, त्याचप्रमाणे माया आणि ब्रह्म या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. जरी या दोन वेगळ्या गोष्टी भासल्या तरी तत्वतः त्या एकच आहेत. छाया कोणत्याही शस्त्राने तुटत नाही. हाताने तिला दूर सारता येत नाही. जमिनीवर लोटांगण घातले तरी ती वेगळी न होता आपल्या अंगाखाली दिसेनाशी होते. आपण उंच झालो तर ती उंच होते, वाकलो तर ती आपल्याबरोबर लवते.

*

आता केशी राजा हेची विनवणी/

 मस्तक चरणी ठेवीतसे//१//

*

देह असो माझा भलतीये ठाई/

 चित्त तुझ्या पायी असो द्यावे//२//

*

काळाचे खंडण घडावे चिंतन/

 तन मन धन विन्मुखता//३//

*

कफ वात पित्त देह अवसाने

 ठेवावी वारुनी दुहिते ही//४//

*

सावध तो माझी इंद्रिय सकळ/

 दिली एक वेळ हाक आधी//५//

*

तुका म्हणे तू या सकळाचा जनिता/

 येथे ऐक्यता सकळांसी//६//

*

इथे परमेश्वराला उद्देशून महाराज म्हणतात,

“हे केशवा, तुझ्या पायांवर मस्तक ठेवून मी तुला विनंती करतो की, माझा देह कुठेही असो, पण चित्त मात्र तुझ्या ठिकाणीच असावे. देह, मन, द्रव्य याचा मोह नष्ट होऊन अखंड तुझ्याच चिंतनात माझा सर्व वेळ खर्च व्हावा. कफ, वात, पित्त या त्रिदोषांचे माझ्या अंतकाळी निवारण व्हावे. जोपर्यंत माझी सर्व इंद्रिये सावध आहेत तोपर्यंत मी तुम्हाला साद घालून वर्तमान परिस्थिती निवेदन करीत आहे. “

सामान्य जन मूढ आहेत, त्यांना परब्रम्ह स्वरूपात द्वैतभावना नाही हेच मुळी समजत नाही. त्यांना तारण्यासाठी भक्तीचे महात्म्य पटवून देणे आवश्यक आहे. तुकाराम महाराज त्यांच्या मनातील हे विचार खालील अभंगात सांगत आहेत.

 याजसाठी भक्ती/ जशी रुढवावया ख्याती/

 नाही तरी कोठे दुजे/ आहे बोलावया सहजे/

 गौरवावयासाठी/ स्वामी सेवेची कसोटी/

 तुका म्हणे अळंकारा/ देवभक्त लोकी खरा//

लोकांमध्ये भक्तीचा गौरव होण्यासाठी स्वामी, सेवक आणि सेवेची कसोटी या गोष्टी येतात. लोकांमध्ये देव आणि भक्त यांचे वरवरचे द्वैत हे भूषण आहे, अलंकाराप्रमाणे आहे. या सगूण भावातूनच हळुहळू जनसामान्यात एकरूपता येते.

ईश्वराशी महाराजांची संपूर्ण तादात्म्य पावलेली अवस्था या अभंगात ते वर्णितात.

 काहीच मी नव्हे कोणीये गावीचा/

मी कोणीच नाही. मला ना नाव ना गाव. जागच्या जागी असणारे जे एकमेव ब्रह्म आहे तेच मी आहे.

*नाही जात कोठे येत फिरोनिया/ मी कोठे जात नाही की मी परत येत नाही.

 नाही मज कोणी आपले दुसरे/

 कोणाचा मी खरे काही नव्हे//

 मी कोणाचा नाही, माझे कोणी नाही, माझ्यात आप-परभाव नाही.

 नाही आम्हा जावे मरावे लागतं/

 अहो अखंडित जैसे तैसे//

आम्ही जगत नाही की मरत नाही, कायम जसेच्या तसे राहतो.

 तुका म्हणे नामरूप नाही आम्हा/

 वेगळा या कर्मा-अकर्मासी//

आम्हाला रूप नाही, नाव नाही, कर्म-अकर्म यापासून आम्ही वेगळे आहोत.

 परमेश्वराशी एकरुपता म्हणजे काय हे आपल्याला तुकारामांच्या या अवस्थेतून स्पष्ट होते.

क्रमशः… १४ 

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares