मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ६५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ६५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- त्या रात्री तारामावशीला खूप ताप भरला. थर्मामिटर लावून पाहिलं तर एकपर्यंत ताप होता. प्रवासाच्या दगदगीने आलेला तो ताप नव्हता हे विषमज्वराचं निदान झालं तेव्हा समजलं.)

नियमित औषधं, पथ्यपाणी, आराम यामुळे तापाला पुढे हळुहळू उतार पडत गेला. तिचा अशक्तपणा कमी झाल्यानंतर तिची मुलगी, जावई दोघे स्वतः येऊन या दोघांना घेऊन गेले. खरं तर ही अगदी साधी घटना, पण त्यात भविष्यांत कधीतरी मला दिलासा आणि शुभसंकेत देणारे धागेदोरे अलगद विणले गेले होते आणि हे मधे बराच काळ उलटून गेल्यानंतर मला आपसूक जाणवणार होतं याची मला कल्पनाच नव्हती. अर्थात त्यामुळेच कदाचित ती घटना मनात जपून ठेवायची प्रेरणा तारामावशीला मिळाली असणार हेही ओघाने आलंच. डोंबिवलीला गेल्यानंतर तिने आवर्जून पाठवलेल्या सविस्तर पत्रात आम्हा दोघांचं भरभरून कौतुक करून आम्हाला मनापासून आशीर्वाद दिले होते!

अगदी योगायोगाने घडलाय असं वाटणारा हा प्रसंग मधल्या काळात आम्ही विसरूनही गेलो होतो. या प्रसंगानंतर दोनतीन वर्षांनी माझ्या लहान भावाचं लग्न ठरलं तेव्हा मावशीला कांही कारणाने समक्ष येणं शक्य झालं नव्हतं तरीही तिने आईकडे भावाच्या संसारासाठी तिची आठवण म्हणून योग्य वस्तू घेण्यासाठी आवर्जून आहेरही पाठवला होता. तिच्या सरळ, मोकळ्या स्वभावानुसार आम्हा कुटुंबियांबाबतचा सद्भावही तिने नेहमीच जपला होता! नात्यांकडून अशा सद्भावनांपेक्षा वेगळी अपेक्षा ती काय असणार? तरीही तारामावशीच्या मनात मात्र यापेक्षा वेगळं, व्यक्त न करता आलेलं असं बरंच कांही ठाण मांडून बसलं होतं आणि तिने मला आवर्जून भेट म्हणून पाठवलेली ती दत्तमहाराजांची प्रसन्न रेखीव मूर्ती हे त्याचंच प्रतिक होतं, हे पुढे मी मुद्दाम तिला भेटण्यासाठी आणि हे सगळं जाणून घेण्याकरता केलेल्या आट्यापिट्यानंतर आमच्या अतिशय केविलवाण्या, करूण अशा मूकसंवादातून मला सांगायचा तिने प्रयत्नही केलेला होता. पण त्यातलं कणभरही कांही माझ्यापर्यंत पोचलंच नव्हतं. त्या संपूर्ण प्रसंगाच्या हळव्या आठवणी आजही मला अस्वस्थ करतायत..!!

आपण बरंच कांही मनाशी ठरवतो, ते आपल्याला अगदी सहजशक्य, अतिशय सोपंही वाटत असतं. पण जे घडतं ते ‘त्या’च्या मनात असेल तर आणि तसंच. आता मुद्दाम वेळ काढून मुंबईला जाऊन

तारामावशीची भेट घेणं आणि तिने माझ्यासाठी पाठवलेल्या दत्तमूर्ती संदर्भात तिच्याशी बोलून त्यामागची तिला मिळालेली प्रेरणा आणि अर्थातच या घटनेमागचा कार्यकारणभाव समजून घेणं माझ्यासाठी फारसं अवघड नसणाराय असंच मी गृहित धरलं होतं, पण नेमकं नियोजन करून मी हे सगळं जुळवून आणायचा प्रयत्न सुरू केला तेव्हा मात्र सहजसोपं वाटणारं हेच सगळं माझ्यासाठी अतिशय क्लेशकारकच ठरलं होतं. तो बोचरा अनुभव मी कधीच विसरणार नाही.

माझ्या टीमसाठीचा आॅडिटटूर प्रोग्राम हातात पडताच त्यातील सूचनांप्रमाणे विदर्भातील कांही रूरल-ब्रॅंचेसचे ऑडिट आम्ही संपवत आणले होते. त्यादरम्यानच्या पुढील नियोजनानुसार आम्हाला नाशिक जिल्ह्यामधील ब्रॅंचेसचा आॅडिट प्रोग्राम मिळाला. त्यात पहिलीच ब्रॅंच होती ती नाशिक-मेन ब्रॅंच. नंतर तिथल्याच इतर दोन लोकल ब्रॅंचेस् करून मग जिल्ह्यातल्या इतर ब्रॅंचेस करायच्या होत्या. त्यासाठी अर्थातच खुद्द नाशिकला सलग कमीतकमी एक महिना तरी आमचा मुक्काम असणार होताच. त्यामुळे सततच्या प्रवासाच्या नेहमीच्या दगदगीतून कांही काळ कां होईना सुटका झाल्याने थोडीतरी स्वस्थता मिळणार होती. नाशिक मेन ब्रॅंचचं आॅडिट सुरू केलं तो शुक्रवार होता. माझे तीनही ऑडिट असिस्टंटस् पुण्याचे असल्याने लगेचच्या शनिवारी काम संपवून त्यांचा पुण्याला घरी जाऊन यायचा बेत होता. त्यामुळे तो शनिवार-रविवार मला एकट्यानेच नाशिकला रहाणं क्रमप्राप्त होतं. शुक्रवारी रात्री उशिरा अंथरूणाला पाठ टेकली तेव्हा याच सगळ्या विचारांमधे मग्न असताना एक पर्याय उसळी मारून वर आला. ‘आपणही या शनिवार-रविवारी इथं एकट्यानेच पडून रहाण्यापेक्षा शनिवारचं हाफ-डेचं रूटीन संपवून मुंबईला जाऊन तारामावशीला भेटून आलो तर..? ‘ हा विचार मनात आला न् सगळी मरगळ निघूनच गेली एकदम. नाशिक-ठाणे बस फ्रिक्वेन्सीज चांगल्या होत्या आणि शेअर टॅक्सीसही मिळू शकत होत्या. प्रवास वन वे साधारण दोन अडीच तासांचा. त्यामुळे ते फारसं दगदगीचंही नव्हतं. माझी सख्खी मावशी, मावसभाऊही डोंबिवलीतच रहायचे. त्यांनाही भेटणं झालं असतं. त्याच उत्साहात रिसेप्शनला फोन करून मी माझ्या मावस भावाचा फोन नंबर दिला आणि अर्जंट काॅल जोडून द्यायला सांगितलं. पाच मिनिटांपूर्वी जे मनातही नव्हतं पण खूप दिवसांपासून मला व्हावंसं वाटत होतं ते आता असं अचानक शक्य होणार होतं. सगळं मनासारखं घडून येणार असल्याचा त्याक्षणीचा आनंद माझ्यासाठी अतिशय अनपेक्षित आणि उत्साहवर्धकच होता!

 मी माझी आॅडिट टूर, नाशिकचा मुक्काम सगळं मावसभावाशी बोललो आणि ‘उद्या बँकेतली कामं संपवून संध्याकाळी तुमच्याकडे येतोय’ असंही सांगितलं. आता सगळं मनासारखं घडणार यात तिळमात्रही शंका नव्हती… पण? … पण ते तसं घडणार नव्हतं. वाटेत दबा धरून बसलेले अनेक खाचखळगे, अडचणी एकेक करून समोर येत मला अस्वस्थ करीत रहाणार आहेत याची मला तेव्हा कल्पनाच नव्हती!

नाशिकपासून व्हाया ठाणे डोंबिवली हा प्रवास तसा स्वस्थपणे झाला. रात्री भावाकडे छान गप्पा, जेवण, आराम झाला. माझा परतीचा प्रवासही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी असल्याने, मी गप्पांच्या ओघात

‘मला कांहीही करून आपल्या तारामावशीलाही भेटून जायचंय रे.. ‘ असं भावाला सांगितलं. ती डोंबिवलीतच रहात असल्याने या मावसभावाचं तिच्याकडे अधून मधून जाणं-येणं असेच.

“ती आणि भिडे काका दोघेही आता त्यांच्या मूळ घरी नाही रहात. ते बऱ्याचदा आता दोन्ही मुलींकडेच असतात” भाऊ म्हणाला.

“कां रे…? “

“कारण असं नाही.. पण मावशीला रोजच्या कामांचीही दगदग होते आता. काकाही थकलेत. त्यामुळे दोन्ही मुली, जावयांनीच हा निर्णय घेतलाय. सध्या ही दोघं डोंबिवलीतल्या तिच्या मोठ्या मुलीकडे, मीनाकडे असतात. मी पंधरा दिवसांपूर्वी त्या दोघांना भेटून आलोय. मीना इथून जवळच्या सोसायटीमध्येच रहाते अरे. अगदी जवळ आहे. ” भाऊ म्हणाला

सकाळी चहा घेताना ‘मी आत्ताच मीनाकडे जाऊन येऊ का रे? ‘ असं भावाला विचारलं. त्याला आणखी एक-दोन ठिकाणी जायचं असल्याने त्याने मला तिच्या घरापर्यंत सोडलं आणि ‘तासाभरात न्यायला येतो.. ‘ असं सांगून तो त्याच्या कामासाठी गेला. निघताना भाऊ मीनाला फोन करू लागला तेव्हा मीच त्याला थांबवलं होतं. फोन करू दिला नव्हता. मला मावशीला सरप्राईज द्यायचं होतं.

पण… सरप्राईज मलाच मिळालं पण ते फारसं बरं नव्हतं. कारण घरी मीना आणि तिचा नवरा-मुलं सगळे होते पण मावशी न् काकाच नव्हते. माझा अर्थातच खूप विरस झाला.

त्या दोघांना थोडा बदल म्हणून ठाण्याला असणारी तिची दुसरी मुलगी न् जावई त्यांच्याकडे घेऊन गेले होते. मला परतीचा प्रवास नाहीतरी व्हाया ठाणेच करायला हवा होता त्यामुळे तिच्याकडे जाऊन, मावशीला भेटून तिथूनच थेट नाशिकला जाण्यात मला अडचण कांहीच नव्हती.

“तू असं कर” मी मीनाला म्हणालो, ” मला तिचा ठाण्याचा पूर्ण पत्ता, फोन नंबर लिहून दे आणि कसं जायचं तेही सांग. मला कांही झालं तरी मावशीला भेटायचंच आहे. तिला भेटल्या- बोलल्याशिवाय मला चैनच पडणार नाही. म्हणून भेटायचंय. “

मीनाने अस्वस्थपणे नवऱ्याकडे पाहिलं.

“तुमची खूप आठवण काढत असतात त्या.. ” मग तिचा नवराच म्हणाला, ” तुम्ही जरूर जा, भेटा त्यांना पण…. “

“पण काय? “

” तिला पॅरॅलिसिसचा नुकताच माईल्ड अॅटॅक आला होता अरे. कालच डिस्चार्ज मिळालाय. आम्ही दोघेही कालपर्यंत ठाण्याला जाऊन येऊनच होतो. त्यामुळे तुला पाहून तिला आनंद होईल, पण पूर्वीसारखं बोलता येत नाहीय तिला अजून… ” मीना म्हणाली.

हे सगळंच खरंच खूप विचित्र होतं. पण तरीही ती ‘माईल्ड अॅटॅक’ म्हणाली होती त्यामुळे त्यात मला फारसं गांभीर्य मात्र जाणवलं नव्हतं. तरीही आज शक्यतो पुरेसा वेळ तिच्याजवळ थांबायला मिळेल असं नियोजन करायचं मनाशी ठरवून मी त्या सर्वांचा निरोप घेतला.

तोवरची माझी उमेद, उत्साह सगळं हे ऐकून विरूनच गेलं होतं. ठाण्याला जाऊन मावशीला भेटल्याशिवाय मला आता चैन पडणं शक्य नव्हतंच. मी भावाच्या घराच्या दिशेने झपाझप चालू लागलो. मन मात्र मावशीच्या काळजीने अस्वस्थ झालं होतं… ‘तिथं ठीक असेल ना सगळं…? .. ‘ हा विचार मनात आला. मी तो एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखा झटकूनही टाकला. पण तरीही कुशंकेची पाल मात्र बराच वेळ मनात चुकचुकतच राहिली होती…!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जागतिक विद्युत सुरक्षा दिन.. अर्थात दीप अमावस्या… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ जागतिक विद्युत सुरक्षा दिन.. अर्थात दीप अमावस्या ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

आज आषाढ महिन्याची अमावस्या!!!

या अमावस्येलाच ‘दिव्याची आवस’ किंवा ‘दीप अमावस्या’ असे म्हटले जाते. या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे घासून-पुसून एकत्र मांडतात. त्याच्याभोवती रांगोळ्या काढतात व ते दिवे प्रज्ज्वलीत करुन त्यांची पूजा केली जाते. पूजेमध्ये पक्वान्नांचा महानैवैद्य दाखविला जातो. त्यावेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात.

‘‘दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌।

गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥”

भावार्थ:-

‘‘हे दीपा, तू सूर्यरुप व अग्निरुप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. ’’

कथा कहाण्या नेहमीच रम्य असतात. जनमानस सुद्धा कथा ऐकण्यास उत्सुक असते. *ज्याप्रमाणे मधाचे बोट लावून आई कडू औषध पाजते, अगदी त्याच मायेने आपल्या पूर्वसूरींनी जनमानसाचा अभ्यास करुन प्रत्येक आध्यात्मिक (खरंतर वैज्ञानिक) तत्व सामान्य मनुष्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आणि यातूनच विविध कहाण्यांची निर्मिती झाली. कहाणीच्या पुस्तकात ‘विविध सण’ आणि ‘व्रतवैकल्ये’ यांच्या मनोहर कहाण्या दिलेल्या आहेत. त्या कहाण्या सांगण्याचा मुख्य हेतू श्रद्धा वृद्धिंगत व्हावी आणि समाजाने नियम पाळावेत असा असावा. कारण तत्कालीन समाजपद्धतीत ‘धर्माने’ अथवा ‘शास्त्राने’ सांगितले आहे असे मानून तसे आचरण करणारी मंडळी पुष्कळ होती.

भारतीय कालमापन पद्धतीप्रमाणे आषाढ महिन्याच्या शेवटी ग्रीष्म ऋतू संपतो. तसेच दुसऱ्या दिवशीपासून वर्षा ऋतूची सुरुवात होते. वर्षा ऋतू स्वाभाविकच जास्त पावसाचा. *पूर्वी विद्युत दिवे नव्हते, त्यामुळे प्रकाशासाठी दिव्यांची गरज होती. दिवा स्वच्छ असेल तर स्वाभाविक त्याचा जास्त प्रकाश पडणार. त्यानिमित्ताने घरातील सर्व दिव्यांची तपासणी (आपण त्यास आजच्या लौकिक भाषेत ‘ऑडिट’ म्हणू शकतो) व्हायची. पूर्वीच्या लोकांना आठवत असेल की कंदील, टूकं (रॉकेल वर जळणार छोटा दिवा), बत्ती असे विविध प्रकारचे दिवे असायचे. त्या दिव्यांची खूप निगा राखावी लागत असे, अन्यथा ऐनवेळी ते दिवे पेटत नसतं. यासाठी उजळणी म्हणून घरातील सर्व दिवे उजळले जायचे. श्रावण भाद्रपद हे दोन्ही महिने मुसळधार पावसाचे आणि तुफानी वादळाचे. त्यामुळे हवामान त्यामानाने थंड. अमावस्या म्हणजे काळोखी रात्र. घरात प्रकाश आणि पुरेशी ऊब मिळण्यासाठी दिव्यांची गरज असतेच. त्यामुळे दिव्यांची डागडुजी, स्वच्छता हा त्यामागील तांत्रिक भाग होता. आजच्या आधुनिक युगात संपूर्ण आषाढ महिना ‘विद्युत सुरक्षा मास’ म्हणून पाळावा असे सुचवावेसे वाटते. घरातील, कार्यालयातील सर्व वायरिंग, प्लग, सॉकेट, अर्थींग, बटन्स, सर्व विद्युत उपकरणे आदि या महित्यात तपासून घ्यावीत, दिवे पुसून घ्यावेत. तसेच दुचाकी, चारचाकी वाहनाचे दिवे, इनव्हर्टर, जनरेटर आदींची आवश्यक ती निगा राखावी. या सर्वांचे मूल्यमापन (तपासणी) दीपअमावस्येला करावी.

(कारण अमावस्या ही सर्वात जास्त काळोखी असते). विशेष करून घरातील गॅस शेगडी तसेच गॅसचा पाईप यांचीही तपासणी करावी कारण ‘स्वयंपाकघर सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित!! ‘ आजच्या भाषेत आपण त्यास जागतिक विद्युत सुरक्षा दिन’ म्हणू शकतो नव्हे तो होताच कारण हा ‘दिन’ संपूर्ण भारतात तितक्याच श्रद्धेने अनेक वर्षे पाळला जायचा आणि आजही पाळला जातो. मधल्या काळात आपण वैज्ञानिक दृष्टिकोन विसरलो आणि आपल्या बऱ्याचशा सणांचा भावार्थ बदलला, तसेच त्याचा यथोचित अर्थ समाजास समजून सांगण्याची व्यवस्था आपण समाज म्हणून प्रस्थापित करण्यात अपयशी ठरलो, खरंतर तसा प्रयत्नच झाला नाही असे खेदाने नमूद करावेसे वाटते. ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून ‘वटपौर्णिमा’, ‘जागतिक विद्युत सुरक्षा दिन’ म्हणून ‘दीप अमावस्या’, ‘जागतिक कृतज्ञता दिन’ म्हणून ‘सर्वपित्री अमावस्या’, जागतिक आरोग्य दिन म्हणून धनत्रयोदशी (धन्वंतरी जयंती), महर्षी नारद जयंतीला ‘जागतिक पत्रकार दिन’ असे बरेच ‘दिन‘ आपण साजरे करु शकतो. कारण या सर्व गोष्टींचा उगम भारतात झालेला आहे. गरज आहे ती फक्त इतिहासाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची!! . आज आपण सर्वांनी प्रण करु की आजपासून ‘दीप अमावस्ये’च्या निमित्ताने घरातील ‘विद्युत सुरक्षा’ आवर्जून पाळली जाईल.

आपल्या मागील सर्व पीडा (अर्थात गैरसमजुती, कोती वृत्ती) जाऊन जीवनात प्रकाश निर्माण व्हावा म्हणून या अमावस्येच्या दिवशी घरामधील सर्व दिव्यांचे पुजन केले जाते. पंच महाभूतांमधील अग्नि तत्वाची ही पूजा आहे. आपल्या पोटातील वैश्वानर नावाचा अग्नी अन्नपचनाचे काम करतो. शरीरातील अग्नीतत्व मंद झाले तर पोट बिघडते. याचाही विचार इथे होणे गरजेचे आहे. या दिवशी घरातील सर्व पितळी दिवे, समया, निरांजने, तांब्याचे दिवे, लामणदिवे, कापूरवाती अश्या सर्वांची पूजा केली जाते. संध्याकाळी दिवेलागणीला ओटीवर गाईच्या शेणानं सारवायचे, रांगोळी काढून त्यावर पाट ठेवायचा. त्यावर सर्व दिवे ओळीने मांडून त्यांना हळदकुंकू, अक्षता, फुलं वाहायची. कणकेचे दिवे करायचे आणि मग त्यात साजुक तूप आणि कापसाची वात घालून सर्व दिवे पेटवून त्यांनी दिव्यांची आरती करून देवाला नैवेद्य दाखवयाचा. भारतीय संस्कृतीमध्ये दिवा, ज्योती, वात, फुलवात यांना महत्त्वाचे स्थान आहे. प्राणाला प्राणज्योत म्हणले जाते, दिवा व प्रकाश यांचे जीवनाशी नाते मानले जाते. सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी लक्ष्मी घरात येते व त्याचवेळी दारिद्र्याची देवता घरातून निघुन जाते अशी श्रद्धा आहे. यासाठीच घराघरात देवापाशी दिवा लावून शुभंकरोति, परवचा म्हणायची पद्धत होती. दिवस मावळतीकडे जातोय आणि रात्रीचा उदय होत असताना, या संधिकालात परमेश्वराचे नाव घेतले तर मनःस्थिती उत्तम राहण्यास मदत होते. मन प्रसन्न असेल तर स्वाभाविक जगही प्रसन्न असते, नाही का?

पूर्वी मुलाला कुळदीपक किंवा वंशाचा दिवा असे संबोधले जायचे किंवा रागाच्या भरात ‘किती दिवे लावलेस ते माहीत आहे’ असेही बोलले जात असे. अर्थात या बोलण्यातील मर्म असे आहे की मुलगा मुलगी कोणीही असो, त्याने घराण्याचे नाव आपल्या शुद्ध आचरणाने आणि कर्तृत्वाने उज्ज्वल करावे. *’उजेडात होते पुण्य, अंधारात पाप’ असे एक गीत आहे. मनुष्याने नेहमी उजेडातील कर्म करावीत असे ही दीप अमावस्या आपल्याला सुचविते असे म्हटले तर वावगे होणार नाही. *

भारतातील अनेक भागांमध्ये मोठमोठ्या गुहांमध्ये सुंदर चित्रकारी, नक्षीकाम पाहावयास मिळते. हे काम दिव्याशिवाय करणे शक्य नव्हते. भारतामध्ये दिव्याचा इतिहास खूप प्राचीन आहे. अग्नीचे प्राचीन काळापासून धर्मकर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. वेदांमध्ये अग्नीला देवतास्वरूप मानण्यात आले आहे. यामुळेच हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यापूर्वी देवासमोर दिवा लावला जातो. त्यामुळे वातावरण प्रसन्न होते. दिवा ज्ञान आणि प्रकाशाचे प्रतिक आहे. पूजेमध्ये दिव्याचे विशेष महत्त्व आहे. सामान्यतः विषम संख्येत दिवा प्रज्वलित करण्याची परंपरा आहे. दीप लावण्यामागचे कारण म्हणजे, आपण अज्ञानाचा अंधकार दूर करून जीवनात ज्ञानाच्या प्रकाशासाठी पुरुषार्थ करावा. हिंदू धर्मशास्त्रानुसार पूजा करताना दिवा लावणे अनिवार्य आहे. गायीच्या तुपाचा दिवा लावल्याने घरामध्ये सुख-समृद्धी येते. घरामध्ये स्थायी लक्ष्मीचा वास राहतो. गायीच्या तुपामध्ये रोगराई पसरवणारे सूक्ष्म किटाणू मारण्याची क्षमता असते. तूप जेव्हा दिव्यामध्ये अग्नीच्या संपर्कात येते तेव्हा वातावरण पवित्र आणि शुद्ध होते. यामुळे प्रदूषण दूर होते. गायीच्या तुपाचा दिवा लावल्याने याचा संपूर्ण कुटुंबातील सदस्यांना फायदा होतो. ‘दीप प्रज्वलन’ हा घराला प्रदूषण मुक्त करण्याचा एक प्राचीन आणि प्रभावी उपाय आहे.

दिवा लावतानाचा मंत्र:-

दीपज्योति:परं ब्रह्म

दीपज्योति: जनार्दन:।

दीपो हरति मे पापं

संध्यादीप! नमोऽस्तु ते।।”

दिवा लावण्याचे नियम: –

  • दिव्याची वात पूर्व दिशेकडे असल्यास आयुष्य वाढते.
  • दिव्याची वात पश्चिम दिशेकडे असल्यास दुःख वाढते.
  • दिव्याची वात उत्तर दिशेकडे असल्यास धनलाभ होतो.
  • दिव्याची वात चुकूनही दक्षिण दिशेकडे करू नये. यामुळे धन आणि जीवित हानी होऊ शकते.

दीप प्रज्वलन करण्यापूर्वी दीपाखाली अक्षता का ठेवाव्यात?

अक्षतांमध्ये असलेल्या पृथ्वी आणि आप तत्वाच्या कणांच्या प्राबल्यामुळे दीपाकडून प्रक्षेपित होणाऱ्या लहरी ग्रहण केल्या जातात अन् आवश्यकतेनुसार आपकणांच्या प्राबल्यावर त्या प्रवाही बनवून वातावरणात भूमीच्या दिशेने प्रक्षेपित केल्या जातात. या लहरी अधोगामी असल्याने त्यांची ओढ भूमीकडे असते, तर दीपातून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींची ओढ आकाशाच्या दिशेने असते; कारण त्या ऊर्ध्वगामी दिशेने संचार करत असतात. अशा प्रकारे कार्यस्थळी दीपाच्या माध्यमातून वातावरणाच्या वरील पट्ट्यात सूक्ष्म-छत, तर अक्षतांच्या माध्यमातून भूमीवर सूक्ष्म-आच्छादन निर्माण होण्यास साहाय्य झाल्याने कालांतराने त्याचे रूपांतर घुमटाकार संरक्षक-कवचात होत असते.

आषाढ महिना संपल्या नंतर श्रावण येतो आणि नंतर भाद्रपद या महिन्यामध्ये मद्यपान व मांसाहार वर्ज्य मानला जातो. म्हणून यादिवशी काही लोकं अति प्रमाणात मांसाहार करतात. आज समाजात ही अमावस्या आज जरा ‘वेगळ्या’ कारणांसाठी प्रसिद्ध झालेली आहे. आज कोकणात तरी ती ‘गटारी अमावस्या’ म्हणून जास्त प्रसिद्ध आहे. सणांचे इतके विडंबन फक्त हिंदू धर्मातच होऊ शकते आणि ते फक्त ‘हिंदूच’ करु शकतात, यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते. धर्मांध असू नये याबाबत सर्वांचे एकमत होऊ शकेल पण धर्माभिमानीही असू नये हा दैवदुर्विलास नव्हे काय? आज आपल्या परंपरा, सण, व्रतवैकल्ये पुन्हा एकदा डोळसपणे समजून घेण्याची आणि समजून देण्याची नितांत गरज आहे अन्यथा पुढील पिढीला आपल्या विज्ञानाधिष्ठित संस्कृतीची माहिती होणार नाही.

उगवत्या सूर्याची पूजा करणारे आपण हिंदू लोकं आहोत. आपल्या परंपरा, आचारविचार ह्या उजळवलेल्या दिव्यांच्या ज्योतीवर धरुन ‘पारखून’ घेऊ आणि तसे आचरण करण्याचा प्रयत्न करुया. प्रत्येक घरात जर असे ‘ज्ञानदीप’ लावले गेले तर आपला देश नक्कीच उजळून निघेल आणि त्या प्रकाशाने साऱ्या जगाचे डोळे दिपतील यात शंका नाही.

शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा |

शत्रुबुद्धि विनाशाय दीपत्ज्योति नमोस्तुते ||”

।। श्रीराम।। 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “छोट्या रेषा मोठ्या रेषा” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? विविधा  ?

☆ “छोट्या रेषा मोठ्या रेषा” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

आमच्या घरचं वातावरण अस्सल मराठी. आधीच्या पिढ्या मराठी शाळेत, मराठी माध्यमातूनच शिकल्या. आम्हीही मराठी माध्यमातूनच शिकलो. पुढची पिढी सुद्धा मराठी माध्यमातूनच शिकतेय. तीही अगदी अभिमानानं.. घरात भरपूर मराठी पुस्तकं, आजही आकाशवाणीचं नित्य श्रवण, मराठी सणवार मराठी पद्धतीनंच साजरे होणारं आमचं घर. घरातले सगळे व्यवहारासाठी उत्तम हिंदी आणि इंग्रजी बोलत, वाचत, लिहित असले तरीही प्रेम मात्र मराठीवरच. हरिवंशराय बच्चन, कवी प्रदीप, नरेंद्र शर्मा, मैथिलीशरण गुप्त, मुन्शी प्रेमचंद यांचं साहित्य आम्हाला सगळ्यांनाच प्रिय असलं तरीही कुसुमाग्रज, वसंत बापट, विंदा, शांताबाई, शन्ना, भा. रा. भागवत, गोनिदा, पुलं यांच्यावर आमचा लोभ अधिक.. ! शेवटी तुमची नाळ जिथं, तुमचं आंतरिक प्रेमही तिथंच.. !

माझा मुलगा लहान होता तेव्हा, मराठी भाषेतली कार्टून्स मिळतात का, ते शोधत होतो. ॲनिमेटेड गाणी मिळाली, गोष्टी मिळाल्या, पण खास मराठी कार्टून मिळालंच नाही. अगदी लहान मुलं सुद्धा हिंदी कार्टून्स पाहतात, हिंदी गाणी ऐकतात. त्यांच्याशी नुसत्या गप्पा मारल्या किंवा त्यांच्या एकमेकांशी चाललेल्या गप्पा ऐकल्या की, त्यात मराठी, हिंदी, इंग्लिश, मिंग्लिश, हिंग्लिश अशा अनेक प्रकारची शब्दसंपदा सापडेल. आता मुलांना शाळेत “मधली सुटी” नसते, “ब्रेक” असतो किंवा “रिसेस” असते. “कवायत” नसते, “पिटी” असते. “पाढे” नसतात, “टेबल्स” असतात. “शाळेचा डबा” नसतो, “टिफीन किंवा लंचबॉक्स” असतो. “निकालाचा दिवस” नसतो, “ओपन डे” असतो. “पालकसभा” नसते, “पीटीएम” असते. वर्गात “बाई” शिकवत नाहीत, “टीचर किंवा मिस” शिकवतात. “पाठ्यपुस्तक” नसतं, “टेक्स्ट” असतं. “गृहपाठ” नसतो, “होमवर्क” असतो. “शिकवणी” नसते, “कोचिंग क्लास किंवा ट्युशन” असते. शाळेत “असेम्ब्ली” असते, त्यात “प्रेअर” असते. इतकंच काय, ती खेळायला जात नाहीत, ग्राउंड ला जातात. त्यांना “कंटाळा” येत नाही, त्यांना “बोअर” होतं.

आजकाल लोक “भेळवाल्याकडे” जात नाहीत, तो “चाट वाला” असतो. “मधल्या वेळचं खाणं” नसतं, त्याला “टी टाईम स्नॅक्स” म्हणतात. “शेंगदाण्याची चिक्की” नसते, तिला “न्यूट्री बार” म्हणतात. “धिरडं” म्हणायचं नाही, त्याला “चिला” म्हणायचं. “फोडणी” म्हणायचं नाही, “तडका” म्हणायचं. “गोंदवण” म्हणायचं नाही, “टॅटू” म्हणायचं.

सर्दी-पडसं झाल्यावर “वाफ” घेत नाहीत, “स्टीम” घेतात. हॉटेलात गेल्यावर तर विचारूच नका. “थंड पाणी” मागत नाहीत, “चिल्ड वॉटर” लागतं. “मेन्यू कार्ड” मागतात, “सूप वन बाय टू” सांगतात, “भाजी” ऐवजी “सब्जी” मागतात, “भाकरी” मागवत नाहीत, “जोवार रोटी” मागवतात. शेवटी “फिंगर बाऊल” आहेच. “पोट तुडुंब भरलं” म्हणत नाहीत, “बल्की झालं” असं म्हणतात.

“खरेदी” नसते, तिला “शॉपिंग” म्हणतात. “वाण्याचं दुकान” नसतं, “सुपर मार्केट” असतं. “इस्त्रीवाला” नसतो, “लॉन्ड्रीवाला” असतो. “औषधाचं दुकान” नसतं, “मेडिकल स्टोअर” असतं. “कपड्यांचं दुकान” नसतं, “शोरुम” असतं. गणपतीची वर्गणी नसते, डोनेशन असतं. शाळांमध्ये “आषाढीची दिंडी” नसते, “आषाढी सेलिब्रेशन” असतं. गणपती फेस्टीव्हल असतो.

“साखरपुडा” नसतो, “रिंग सेरेमनी” असतो. “प्री वेडिंग शूट” असतं. “पंगत” नसते, “बुफे” असतो. जेवणात “दहीभात” नसतो, “कर्ड राईस” असतो. “जीरा राईस – दाल तडका” असतो. “भजी” नसतात, “पकोडे” असतात. व्हेज भूना, मसाला बेंगन, व्हेज अद्रकी, व्हेज मराठा, व्हेज दिलबहार, नर्गिसी कोफ्ता असली नावं असतात.
मराठी लग्नात मराठी गोड पदार्थ नसतातच, बंगाली स्वीट असतं.

आता तर “उपवासाचा फराळी चिवडा” म्हणणंसुद्धा संपलंय, “फलाहारी चिवडा” असं म्हणायचं म्हणे. “शेवपुरी दहीपुरी” नं तर त्यांचं इंग्रजी नामांतर केव्हाच स्वीकारलं आहे, त्या स्वतःला “एस्पीडिपी” असं मोठ्या झोकात म्हणवून घेतात. पाणीपुरी खाल्ल्यावर लोक ‘सुखी पुरी’ मागतात. मराठी पाणीपुरी वाल्याला सुद्धा “थोडा प्याज देना और तिखा पुरी बनाना भैय्या” असं म्हणतात.

आकाशवाणी आणि दूरदर्शन सोडलं तर शुद्ध मराठी भाषा माध्यमं सुद्धा वापरत नाहीत. एफ एम चॅनल्स चं मराठी तर अगाध असतं. बाकी ‘तो व्यक्ती, तो पेन, ती बुक’ हे तर ऐकून ऐकून कान किटले. “मिळालं, सापडलं आणि भेटलं” यांच्या वापराचा घोळ तर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. पत्ता भेटला, मोबाईल भेटला, मार्क भेटले, जागा भेटली, तिकीट भेटलं, मार्कलिस्ट भेटली, निकाल भेटला, जेवण भेटलं, पाणी भेटलं, नाश्ता भेटला, कपडे भेटले, पार्सल भेटलं, कुरिअर भेटलं… औषध भेटतं, कॅब भेटते, ऍडमिशन भेटते.. पासवर्ड भेटतो, पैसे भेटतात, कर्ज भेटतं.. देवा रे देवा… !

आमच्याकडचे सणसुद्धा आता मराठीपण सोडून पल्याड निघालेत. अगदी गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा जेवणात पनीर? लग्नात सुद्धा नवरदेव मराठी पोशाख करत नाही. शेरवानी, जोधपुरीची चलती.. आता मराठी लग्नात पाठवणी होत नाही, बिदाई होते. राखीपौर्णिमेला राख्या सुद्धा डोरेमॉन, मिकी माऊस, टॉम अँड जेरी च्या मिळतात. पण पांडुरंगाची राखी मिळत नाही, शिवाजी महाराजांची राखी मिळत नाही, भगव्या झेंड्याची राखी मिळत नाही. महाराष्ट्रातल्या शाळेत आता हरतालिका, भोंडला, श्रावण शुक्रवार, पिठोरी अमावस्येचा मातृदिन होत नाही. पण ख्रिसमस होतो. गणपतीला पाच दिवस सुट्टी मिळत नाही, पण ख्रिसमसला पाच दिवस सुट्टी मिळते.

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ आजही लाखो मराठी घरातून पाहिला जातो. मराठी बिग बॉस किंवा कॉमेडी शो यांनी मराठीची शोभा वाढवली आहे की हसं केलं आहे? ‘नक्षत्रांचे देणे’ सारखा दर्जेदार मराठी कार्यक्रम पुन्हा का होत नाही? मराठी वाहिन्यांवर ‘संतवाणी’ का लागत नाही? सह्याद्री वाहिनी वर पूर्वी संध्याकाळी प्रक्षेपण सुरु होताना संतवाणी लागत असे. मराठी वृत्तनिवेदक शुद्ध मराठीत बातम्या देत असत. एखादा शब्द चुकला तरी त्याक्षणी ‘माफ करा’ असं म्हणत. आता मराठी महिन्यांवर मराठीचाच आग्रह धरणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर ‘सावरकर नायक की खलनायक?’ असे कार्यक्रम मराठी संपादकच करतात. नाना पाटेकरांसारखा एखादा अपवाद वगळता, एकही तरुण मराठी सेलिब्रिटी अस्खलित मराठीत मिडियाशी बोलत नाही. दर वाक्यात भरमसाठ इंग्रजी शब्द.. ! कुठल्याही मराठी चित्रपट सोहळा किंवा मराठी वाहिन्यांचे पुरस्कार सोहळे पहा. कितीजण अस्सल मराठी पोशाखात पुरस्कार स्वीकारतात त्याचं निरीक्षण करा. तुम्हाला उत्तर मिळेल.. !

अहो, उन्हाळ्यात आंब्याची खोकी सुद्धा इंग्रजी भाषेतली असतात. व्यापारी मराठी अन् मालाची खोकी मात्र इंग्रजी.. चितळे बंधूंची बाकरवडी इंग्रजी भाषेतल्या वेष्टणात मिळते. मॅगीचं पॅकिंग आजही इंग्रजीच आहे. त्यावर मराठी भाषा कुठंय? हल्दीराम चं उत्पादन महाराष्ट्रातच होतं, पण पॅकिंग मात्र पूर्ण इंग्रजी भाषेतच.. !

मराठी सिनेमे, मराठी जाहिराती, मराठी मालिका, मराठी अपार्टमेंट्सची नावं सगळीकडं मराठीचा लोपच दिसेल. “वरण भात लोनच्या अन् कोण नाही कोनच्या” असला मराठी चित्रपट करणाऱ्या मराठी माणसाला मराठी भाषा, मराठी संस्कृती याविषयी एक शब्द तरी बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? हे सगळं शांतपणे, साकल्याने पाहिलं म्हणजे, आपल्या जीवनशैलीतलं मराठीपण हळूहळू कसं, कुठं आणि कुणामुळं सुटत चाललं आहे, हे लक्षात येईल.

मराठी टिकवायची असेल, जोपासायची असेल, समृद्ध करायची असेल तर, मराठीतून विचार करायला शिकवलं पाहिजे. मराठी वाचन वाढवलं पाहिजे. एकमेकांशी मराठीत बोललं पाहिजे. अभ्यासक्रमात हिंदी असो, इंग्रजी असो किंवा अन्य भाषा असो, कितीही पुस्तकी शिकवलं तरी कुठलीच भाषा मातृभाषेची जागा घेऊ शकणार नाही, हे त्रिवार सत्य आहे.

स्व. लता मंगेशकरांच्या सुरुवातीच्या काळातली आठवण आहे. त्यांचं गाणं ऐकल्यावर अभिनेते दिलीपकुमार असं म्हणाले होते की, “इस की आवाज से मराठी दाल भात की बू आती है”. लतादीदींनी त्यानंतर हिंदी उच्चारणात इतकं नैपुण्य प्राप्त केलं की, अख्खी हिंदी चित्रपटसृष्टी त्यांच्या आवाजापुढं नतमस्तक होऊन उभी होती. भाषा आत्मसात करायची असते ती अशी.. !

हिंदी भाषेच्या सक्तीमुळे जर मुलं मराठीचा संस्कार विसरणार असतील, तर मग पहिलीपासून इंग्रजीची सक्ती का केली आहे? की, हिंदीसाठी आणि इंग्रजीसाठी वेगवेगळा न्याय आहे? पहिलीपासून इंग्रजीची सक्ती केल्यामुळे मुलं मराठीचा संस्कार विसरणार नाहीत का? जेव्हा मराठी मुलं फास्टर फेणे वाचण्याऐवजी हॅरी पॉटर वाचतात, तेव्हा मराठीचा संस्कार पुसट व्हायला सुरुवात होते. रस्त्यावर, चौकात बाईक आडवी लावून त्यावर केक ठेवून वाढदिवस साजरा होताना इंग्रजी शुभेच्छा दिल्या जातात, तेंव्हा मराठीचा संस्कार पुसट होतो. मराठी माणसं दारात रांगोळी काढण्याऐवजी रांगोळीचं स्टिकर लावतात, रेडीमेड गुढीचं वस्त्र, नाडीचं किंवा इलास्टिकचं सोवळं, रेडीमेड नऊवारी साडी विकत आणतात, तेव्हा तिचं वरवरचं रुप जरी सोयशास्त्राचं असलं तरीही वास्तव मात्र मराठीपण न शिकल्याचंच असतं. गणपती उत्सवात आरती सुद्धा रेडीमेड म्युझिक सिस्टिमवर लावतात, दसऱ्याची पाटीपूजा विसरतात, ऐन दिवाळीत घराला कुलूपं लावून ट्रिपला जातात, घरातली संध्याकाळची शुभंकरोती बंद होते, तेंव्हा मराठीचा संस्कार पुसट व्हायला लागतो. पिठलं भाकरी खाण्यासाठी जेंव्हा हॉटेल गाठायला लागतं, तेव्हा मराठीचा संस्कार पुसट व्हायला लागतो.

ज्या दिवशी आपण सगळी मराठी माणसं फोनवर बोलताना हॅलो ऐवजी राम राम किंवा नमस्कार म्हणायला लागू, आपला वाढदिवस तिथीनुसार साजरा करायला लागू, घरांची दारं उघडी ठेवायला लागू, घराघरात ज्ञानोबा तुकोबांचे अभंग ऐकले- म्हटले जातील, नित्य हरिपाठ होईल, सणावाराला अकरा अकरा आरत्या अख्खं कुटुंब एका सुरात म्हणेल, जेवणाची सुरुवात “वदनी कवळ घेतां” म्हणून होईल, शुभकार्याच्या पत्रिका फक्त मराठी भाषेतूनच छापल्या जातील, तेंव्हा मराठी पुन्हा रुजायला लागेल, तिला नव्यानं पालवी फुटेल.

मराठी घरांमधल्या ज्येष्ठ नागरिकांनी स्वतः हरी तात्या, चितळे मास्तर व्हायला सुरुवात केली की, त्रिभाषा सूत्र असो किंवा बहुभाषा सूत्र, मराठी तिच्या स्थानी अढळ राहील. “ये रे पावसा” पासून ते मोरोपंतांच्या आर्यांपर्यंत मुलांपर्यंत प्रत्यक्ष शिक्षकांच्या, पालकांच्या मुखातून पोचेल, तेंव्हा मराठी टिकेल. मराठी कुमार साहित्य अधिकाधिक निर्माण होईल, तेव्हा मराठीचा पाया सिंधुदुर्गासारखा भक्कम होईल. मराठी कुटुंबं अडलॅब्स इमॅजिका ऐवजी शिवसृष्टी, झपूर्झा पहायला जातील, तेव्हा मराठीचा संस्कार ठळक होईल.

जेंव्हा आपल्याला आपलं स्वत्त्व, तत्त्व आणि सत्व टिकवायचं असतं ना, तेंव्हा स्वतःच्या रेषा ठळक करायच्या असतात, मोठ्या करायच्या असतात. दुसऱ्यांच्या रेषा खोडत बसायच्या नसतात. आपली रेषा मोठी करण्याचं तंत्र आणि मंत्र आपल्याला उमगलं असेल तर चिंतेचं कारणच काय?

© श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शोध गुरुचा… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

?विविधा ?

☆ शोध गुरुचा… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

अनेक जणांचे गुरुबाबतचे अनुभव ऐकताना, वाचताना गुरुबद्दल एक वेगळीच प्रतिमा माझ्या मनात तयार झाली. ती मांडण्याचा हा प्रयत्न.

विश्वामध्ये जन्माला आल्यानंतर मी कोण, माझे उद्दिष्ट काय, माझ्या आजूबाजूचं जग कसं आहे, ते असं का आहे, ते तसं का नाही असे अनेक प्रश्न प्रत्येक मनुष्य जीवाला पडतात. कारण त्याच्याजवळ ‘विचार’ ही एक वेगळी शक्ती आहे. या प्रश्नांची उत्तरे शोधताना गरज असते ती ‘गुरु’ची. मग आता गुरु कोण? तो कसा शोधावा? याबाबत जीवाची धडपड सुरू होते.

या धडपडीत जाणवलं ते म्हणजे गुरु शोधण्याचा हा प्रवास हीच खरी मज्जा आहे म्हणजे आनंद या अर्थाने. कारण या प्रवासात गुरुपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःला जाणून घेण्याचं, शोधण्याचं कामच आपल्याला करावं लागतं. म्हणजेच स्वतःवर काम केल्याशिवाय गुरु मिळत नाही. आणि आपण अगदीच कोरडे राहून त्याच्यापुढे गेलो तर लाभत नाही.

हे काम करताना आपण जगत असलेल्या आणि आपल्या जगण्यात अभाव आहे, असं वाटत असलेल्या गोष्टींच्या मूल्याची जाणीव होते. थोडक्यात आपले ज्ञानचक्षु जागृत होतात. आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीची जाणीव होणं, त्याचं मूल्य समजणं, एखाद्या गोष्टीतला नको असलेला भाग काढून टाकता येणं म्हणजेच एक प्रकारचं ज्ञान मिळवणं आहे. ही जाणीव या प्रवासात निर्माण होणं आणि त्यातून प्रेरित होऊन असे ज्ञानाचे कण कण गोळा करायला आपण प्रवृत्त होणं ही गुरूच्या जवळ जाण्याची पहिली पायरी असावी असं मला वाटतं.

ज्ञानचक्षुंच्या जागृतीमुळे हा प्रवास सातत्याने, विश्वासाने करत राहिल्यावर आपल्याकडे असे छोटे छोटे ज्ञान बिंदू जमा होत जात असतील. आणि समान गोष्टी एकमेकांना आकर्षित करत राहतात या न्यायाने आपण हळूहळू गुरुच्या जवळ जाण्याच्या मार्गावर राहातं असू. हा प्रवास दिर्घपल्ल्याचा आहे. त्यामुळे त्यावर असणारे अनेक मोह हेच खाचखळगे आहेत. याच घसरत्या वाटा आहेत. पण त्या वेळेला गुरुचा सूक्ष्म अंश आपल्याला मार्गदर्शन करतो आणि तो सूक्ष्म अंश म्हणजे आपलं अंतर्मन. हे अंतर्मन आपल्याला सूचना देऊन पुन्हा आपल्या मूळ मार्गाकडे मार्गस्थ करत राहतं. अनेक अडचणीच्या प्रसंगी पहा आपल्या अंतर्मनाला अनेक धोक्याच्या सूचना मिळालेल्या असतात किंवा अचानक समस्येवर उत्तर सापडलेल असतं तेव्हा हे अंतर्मनच आपल्या मदतीला धावून आलेलं दिसतं. तर हे अंतर्मन म्हणजे गुरुचा सूक्ष्म कण आपल्या मदतीसाठी आपल्याबरोबर आलेला आहे.

असा प्रवास करत जेव्हा प्रत्यक्षात गुरु भेटतो तेव्हा नक्की काय घडत असेल? मला वाटतं जर ज्ञान ही गोष्ट गुरु स्वरूपात मानली, तर ज्ञानाच्या मोठ्या साठ्यात ज्ञानाचे असे छोटे छोटे ओहोळ येऊन मिसळले तर जे काय होईल ते घडत असेल. ज्ञान ज्ञानात मिसळून जात असेल. आणि प्रत्येक प्रश्नाला उत्तरं असतातच आणि प्रश्न म्हणजे न संपणारी समस्या नसून उत्तरांपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग असतो ही शहाणीव निर्माण होत असेल.

असा गुरुचा शोध घेण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न कळतनकळत चालू असतो. तो सफल व्हावा आणि प्रत्येकाला गुरु मिळावा याच गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा!

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मर्यादा… ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

? विविधा ?

☆ मर्यादा… ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

मर्यादा हा शब्द एखाद्या गोष्टीची, घटनेची सीमा दर्शवतो. मर्यादा दोन प्रकारची असते. एक अदृश्य स्वरूपाची, दुसरी दृश्य स्वरूपाची.आकाश, पाणी, वायु, तेज, क्षतिज, अमर्यादीत असते ही मर्यादा अदृश्य स्वरूपाची. तर नदीला तीराची, घराला भिंतीची, गावाला वेशीची मर्यादा असते ही दृश्य स्वरूपाची मर्यादा असते.आपल्या आचरणातून आपले संस्कार दिसतात. प्रभू रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जातात. त्यांची प्रत्येक गोष्ट एका मर्यादेत होती.त्यांच्या कृतीत भावने पेक्षा कर्तव्यश्रेष्ठ होते.म्हणून आज ही समाजात रामाचा आदर्श समोर ठेवला जातो.एखादी गोष्ट आपल्या आवाक्यात नसते तेव्हा आपण हे काम माझ्या मर्यादे पलिकडेचे आहे असे म्हणतो.व्यवहार करताना आपण आपल्या वागण्या बोलण्यात एक मर्यादा आखून घेतलेली असते. त्यानुसार आपण आपले आचरण ठेवतो आणि असे वागल्याने आपल्याला एक मानसिक समाधान मिळते.मर्यादा ही संकल्पना नेहमी संस्कार दर्शवणारी असते. पण जेव्हा याचे उल्लंघन होते तेव्हा बऱ्याच वेळा अनिष्ट प्रसंगांना सामोरे जावे लागते. मर्यादा ही संकल्पना बऱ्याच वेळा अनुशासन ही दर्शविते.कायदेशीर चौकटीत राहून काम करावे लागते जर चौकट मोडून काम केले तर कायद्याचे उल्लंघन होते समाजात अराजकता पसरण्याची शक्यता निर्माण होवू शकते.

अंथरूण बघून पाय पसरावे अशी मराठीत एक म्हण आहे.या म्हणीचा सरळ सरळ अर्थ असा आहे की आपण आपली मर्यादा ओळखावी आणि त्या मर्यादेतच आपले वर्तन करावे. बेडकी फुगली तर तिचा बैल होत नाही. ही म्हण ही याच अर्थानं आहे. माणसाने आपली कुवत न ओळखता दुसऱ्याची बरोबरी केली त्याचासारखं वागण्याचा प्रयत्न केला तर, यश तर येतच नाही. काही वेळेस जीव ही गमवावा लागतो. म्हणजेच काय तर आपण आपली शारीरिक, बौद्धिक, आर्थिक क्षमता ओळखावी. आपली मर्यादा ओळखून त्या प्रमाणात कार्य करावे म्हणजे यश हमखास येईल.

महिलांच्या बाबतीत मर्यादा हा शब्द जास्त संवेदनशील आहे. बालपणापासून शेवटच्या क्षणापर्यंत कळत नकळत अनेक मर्यादांचे ओझे तिला सहन करावे लागते. काही वेळा या मर्यादेचा अतिरेकही होतो. महिलेला मर्यादा म्हणजे एक काटेरी कुंपण वाटते कारण त्यात तिचा विकास, तिची अभिव्यक्ती, तिचे स्वातंत्र्य, तिचे व्यक्तिमत्व गुरफटून जाते.

मर्यादा आणि बंधन हे नीट समजून घेणे गरजेचे आहे. बंधन जाचक असते.पण मर्यादा स्त्रीने स्वतः ठरवून घ्यायची असते. एकदा का तिने मर्यादा ठरवून घेतली की ती घरादारात मुक्तपणे वावरू शकते.सासर माहेरच्या प्रतिष्ठेसाठी, मुला बाळांच्या भविष्यासाठी, स्वतःच्या उद्धारासाठी, महिलेला नेहमीच स्वतःभोवती एक मर्यादा आखून घ्यावी लागते.

ही मर्यादा असणे म्हणजे तिचे पारतंत्र नव्हे. स्वातंत्र्याचा अर्थ लक्षात घेऊन आपल्या बुद्धीला जे पटेल तेच काम करावे. पण सर्व साधारण विचार करता. कुटुंबात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी, कुटुंबात आनंद निर्माण करण्यासाठी, आपलं व्यक्तिमत्व उत्तम राहण्यासाठी, एक मर्यादा मनाशी असणं गरजेचं आहे. मर्यादा म्हणजे पारतंत्र नव्हे ही गोष्ट मनी ठरवणं गरजेचे आहे तरच कुटुंब व्यवस्था अबाधित राहील.

कोणत्याही विषयाला एक मर्यादा असते. मी जर मर्यादे पलीकडे लिहीत बसले तर तुम्ही वाचणार नाही. आता इथेच थांबते माझ्या लिहिण्याची मर्यादा लक्षात घेऊन.

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “पाऊस अंगणातला-पाऊस मनातला” ☆ सौ. अर्चना देशपांडे ☆

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

? विविधा ?

☆ “पाऊस अंगणातला-पाऊस मनातला” ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

व्हाट्सअप वर एक छान संवाद वाचण्यात आला पावसाबरोबरचा. एक माणूस पावसाला विचारतो’ “पावसा ‘पावसा तुझे वय किती? ” पावसाने छान उत्तर दिले” जर तू पावसात भिजत ;नाचत असशील तर माझे वय दहा वर्षे. जर तुला कविता सुचत असतील तर मी अठरा वर्षाचा. जर ट्रेकिंग ला जावेसे वाटत असेल तर मी वीस वर्षाचा आणि तुला बायकोसाठी गजरा घ्यावासा वाटत असेल तर मी तीस वर्षाचा”स्मित हास्य करून पावसाने उत्तर दिले. तू जसा अनुभवशील तेच माझे वय असेल.

प्रत्येकाला वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या कारणासाठी पाऊस आवडत असतो. काहींना तो रोमँटिक वाटतो तर शेतकऱ्याला अमृतधारा वाटतो.

तसे पाहता प्रत्येकाला पाऊस आवडतोच. बालवयात मुलांना पावसात भिजायला, साठलेल्या पाण्याचे शिंतोडे इतरांच्या अंगावर उडवण्यात मजा वाटते मग त्यांचे बूट मोजे ओले झाले तरी त्यांना त्याचे भान नसते.

वय वाढत जाईल तसा पावसाचा आनंद वेगवेगळ्या वळणावर भेटत राहतो. धो धो पावसात मित्राबरोबर आईस्क्रीम खाण्यात मजा वाटते आणि घरी भिजून आल्यावर उबदार कपडे घालून गरम गरम भजी खाताना आनंद द्विगुणीत होतो. वर्षा सहली भिजताना तर वेगळीच अनुभूती मिळते.

आपल्या थेंबाने चातकाची भूक भागवणारा, मयूराला नाच करण्यास उद्युक्त करणारा पाऊस सर्वांना हवाहवासा वाटतो.

अंगणात पाणी साचले की छान वाटतं, अंगणातील झाड -वेली न्हाऊ -माखु घातलेल्या लेकरासारख्या टवटवीत दिसतात. पक्षी कुडकुडत वळचणीची जागा शोधतात. नदी नाले पाण्याने तुडुंब भरून वाहतात, डोंगरातून पांढरे शुभ्र धबधबे खाली येतात तेव्हा डोळ्याचे पारणे फिटते. झोपडीत पाणी गळत असले तरी पीक हाती येणार या विचाराने शेतकरी सुखावतो.

असा हा पाऊस सृष्टीला हिरवा शालू नेसवणारा, धरणी मातेला सृजनाचं समाधान देणारा, प्रत्येकाची तृष्णा भागवणारा आणि मनाला सुखावून टाकणारा असतो. पावसाने येणारा मृदगंधाने चित्त वृत्ती उल्हासित होतात पण जेव्हा तो रौद्ररूप धारण करतो तेव्हा माळीन सारख्या गावाचे होत्याचे नव्हते होते तेव्हा पुढील कविता मनात येते

इकडे तिकडे चोहीकडे

संतत पडती पाऊस धारा

रानं गावं जलमय झाली

गुराढोरांना नाही निवारा… १

*

अरे पावसा असा कसा रे

थैमान घालून आलास

घरदार गेलं वाहून

हातचं पीक गेलं कुजून.. २

*

रस्त्यात कोसळल्या दरडी

वाहतुकीची झाली कोंडी

भिंत घराची कोसळली

कुटुंब गेलं गाडलं खाली… ३

*

शेतकरी राजा चिंतित

पावसा थांबव. हाहाःकार

बळी राजाला बळ दे

करून जरा सहकार… ४

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वारी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

☆ वारी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

भक्ती मार्गाचे दृश्य रूप म्हणजे वारी! ज्या वारीमध्ये प्रत्येक सामान्य माणूस विठ्ठलाच्या प्रेमाने भारावून जाऊन पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत असतो. त्यावेळी गरीब- श्रीमंत, लहान- मोठा असे सर्व भेदभाव नाहीसे होतात.

‘ज्ञानदेवे रचिला पाया,तुका झालासे कळस’असे आपण म्हणतो कारण आपल्या भागवत धर्माचा पाया घालणारे हे संत आहेत.

आपली वारीची परंपरा तेराव्या शतकापासून चालू आहे!

  ज्ञानदेवांपासून सुरू झालेला भागवत पंथ तुकाराम महाराजांच्या काळामध्ये कळसाला गेला!

निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही चारी भावंडे  ज्या काळात जन्मली त्या काळात ब्राह्मण- ब्राह्मणेतर भेदभाव मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत होता. या चारही  मुलांना संन्याशाची मुले म्हणून वाळीत टाकले गेले. ज्ञानदेवांनी पैठण पर्यंत जाऊन यासाठी न्याय मागितला. तरीही पैठणच्या

ब्रम्ह वृंदा ने त्यांना न्याय दिला नाही पण त्यामुळेच ज्ञानदेवांनी आपल्या ज्ञानाने तसेच इतर लोकांना जागृत करण्यासाठी पैठण ते आळंदी या प्रवासात काही चमत्कारही केले आणि पुढे ज्ञानेश्वरी ही सांगितली. जेव्हा त्यांची महती कळून आली तेव्हा सामान्य लोकांनी त्यांना मानाचे स्थान दिले. त्या काळात पंढरपूरच्या विठोबाला जाण्यासाठी सर्व भक्त मंडळी पायी चालत जात असत. त्यामध्ये सावता माळी, गोरा कुंभार, तसेच चोखामेळा, सोपानदेव,बंका,

जनाबाई , बहिणाबाई, अशी

अठरा पगड जातीतील मंडळी वारीला जात असत. त्या भक्ती भावाने भारलेल्या वातावरणामुळे

समाजातील भेदाभेद कमी होऊन लोक एका समतेच्या पातळीवर एकत्र येत असत. वारीमुळे झालेला हा सर्वात मोठा परिवर्तनाचा विषय होता. 

पुढे ही वारीची परंपरा कायम चालू राहिली. आळंदीहून ज्ञानेश्वरांची पालखी तर देहू वरून तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरला जाण्यासाठी निघतात. आजच्या आधुनिक काळातही लाखो लोक या वारीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतात.अगदी परदेशातूनही अशी वारी अनुभवण्यासाठी लोक येतात.अशा वारीच्या ठिकाणी वेगवेगळे व्यवसाय ही मोठ्या प्रमाणावर चालतात.वारी निमित्ताने प्रसादाची दुकाने, हळदी कुंकू,अबीर बुक्का, देवाच्या मूर्ती,टाळ,माळा अशा विविध वस्तूंचे बाजार भरतात.काही वेळा आपले मन हे बघून अचंबित होते.काय असेल या वारीची महती आणि अनुभूती! इतकी श्रद्धा, भक्तीभाव या लोकांना चालण्यासाठी ताकद देतो. कितीतरी वृद्ध माणसे  वारीमध्ये कित्येक वर्षापासून चालत जात आलेली आहेत!

‘पंढरीची वारी’ या मराठी सिनेमाची कथा  वारीतील भक्ती भावावर गुंफलेली आहे. श्रद्धेच्या जोरावर माणूस कोणतीही गोष्ट करू शकतो एवढे मात्र खरे!’

   ‘वारी’ म्हणजे सातत्य! एखादी गोष्ट सातत्याने घडते तेव्हा ती वारी असते!हाच शब्द दुसऱ्या अर्थाने ‘वाऱ्या करणे’ असा ही वापरला जातो.एखादा मुलगा

शिक्षणात कच्चा असेल तर

एकाच वर्गात अनेक वेळा रहातो, तेव्हा तो किती वर्ष दहावी ची किंवा बारावी ची वारी करतोय असे उपहासाने म्हटले जाते.

 पण  तीर्थक्षेत्राची वारी ही

आपल्या ला पुण्यदायी असते.

 वारी मुळे मनोवृत्तीत  बदल होतो हे मात्र निश्चित!

 यात्रा ही एकदा घडली तरी

पुष्कळ,पण वारी मात्र वरचेवर सातत्याने घडणारी असते..

आता शाळा शाळांतून वारकरी दिंडी,वारी यासंबंधी बरीच जागरूकता दिसते.लहान मुलांना आवडणारा तो एक सोहळा असतो. छोटी छोटी मुले धोतर नेसून तर मुली,जरीचे,खणाचे परकर. पोलके,साडी अशा

वेशात शाळेत येतात.छोटीशी

पालखी, तुळशी वृंदावन, टाळ चिपळ्या , तुळशीची माळ अशा सर्व गोष्टी या लहान मुलांच्या वारीमध्ये असतात. असे कार्यक्रम मुलांना खूप आवडतात.आपला समाज हा उत्सव प्रिय आहे.धार्मिकतेला सामाजिक जोड दिली की ती गोष्ट चांगली रुजली जाते. नकळत त्यांच्यावर एक चांगला संस्कार घडत असतो. आपल्या हिंदू धर्मात असणाऱ्या अनेक सणावारांचा आपण मुलांवर संस्कारासाठी उपयोग केलाच पाहिजे. अर्थात अलीकडे या गोष्टीबाबत बरीचशी जागृती झालेली आहे. धार्मिक गोष्टींमुळे वागण्यामध्ये एक प्रकारचा सुसंस्कृतपणा, शिस्त येत असते.

तसेच अशा गोष्टी करताना शाळेत त्याविषयीच्या माहिती चा बोर्ड लिहिणे, गोष्टी सांगणे, छोट्या छोट्या स्पर्धा घेणे,

(उदा.सजावट,फॅन्सी ड्रेस,कथा कथन)

यामुळे मुलांचा चौकसपणा, एकत्रित काम करणे तसेच सहभाग घेण्याची प्रवृत्ती वाढीला लागते. आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काही हेतू असतो, तो हेतू समजून घेऊन कोणत्याही रूढी, परंपरा चालू ठेवणे हे सुशिक्षित आणि सुसंस्कृत समाजाचे वैशिष्ट्य असते. वारीच्या निमित्ताने  येणारे बरेचसे विचार हे  धार्मिक, सामाजिक तसेच शैक्षणिक या सर्व प्रकारे वृद्धिंगत झाले पाहिजेत.

ही समाजामधली वारी झाली. पण  जन्मापासून मृत्यूपर्यंत अशी जीवाची वारी असते. जो मानव जन्म आपल्याला मिळालेला असतो तो आपण चांगल्या प्रकारे

व्यतीत केला पाहिजे. बालपण तरुणपण आणि वृद्धावस्था या आपल्या जीवन वारीचे तीन महत्त्वाच्या टप्पे आहेत. प्रत्येक टप्पा तितकाच महत्त्वाचा आहे. त्या त्या अवस्थेत आपल्याला आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण चांगल्या गोष्टीसाठी घालवायचा आहे ही खूण गाठ मनाशी बांधली पाहिजे. तेव्हाच ही जीवाची वारी ही यशस्वी होत जाईल. त्या साठी विठ्ठलाचे स्मरण करून आपण वारीची

वाटचाल सुरू ठेवायची असा

मी मनाशी संकल्प करते!

‘ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राज माऊली तुकाराम!….’

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “गुरु पौर्णिमा…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

🔆 विविधा 🔆

☆ “गुरु पौर्णिमा” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

नमस्कार नमस्कार,

आज खूपच पवित्र अशा सणाचा दिवस आहे गुरुपौर्णिमा.

प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरुचे स्थान हे खूपच आगळे वेगळे आणि महत्त्वाचे असे असते.

घरामध्ये आई-वडील आपले गुरु असतात, आजी आजोबा आपले गुरु असतात, आपले भाऊ-बहीण / काका काकू/ मामा मामी/ आत्या मावशी, हे आपले गुरु असतात. लग्न झाल्यानंतर बायको पण आपली गुरु असते (बायकां करता नवरा गुरु असतो का नाही याबद्दल माहिती नाही). आपले नातेवाईक, आपले शेजारी, आपल्या ओळखीचे, आपले मित्र-मैत्रिणी (मेघना आणि मनवा पण) हे पण आपले गुरु असतात.

शाळेमध्ये, कॉलेजमध्ये आपल्याला छान शिक्षण देणारे आपले गुरु असतात, त्यामुळे नोकरी / उद्योग धंदे / कामधंदे आपल्याला करता येतात आणि यामध्ये आपली छान प्रगती होते. त्यामुळे आपले आणि कुटुंबीयांचे जीवन सुखकर होण्यास खूप मदत होते.

जीवन कसे सुंदर जगावे याचे धडे आपण या सगळ्यांकडून घेत असतो, आणि छान जीवन जगण्याच्या मार्गावर आपण पुढे पुढे जात असतो.

योग करणे, ध्यानधारणा करणे, व्यायाम करणे, याचे शिक्षण आपल्याला त्या त्या क्षेत्रामधल्या गुरुवर्यांकडून मिळत असते. त्यामुळे आपण उत्तम तब्येत ठेवून छान आयुष्य जगू शकतो. आनंदाने आणि उत्साहाने जीवन जगू शकतो. ताणतणावरहीत (stress free) जीवन जगू शकतो, ज्याची आजच्या जगात सगळ्यांना खूप गरज आहे.

आणि खरं म्हटलं तर आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून, निसर्गाकडून, प्राणीमात्रांकडून,जीवजंतूकडून, जीवन आनंदात आणि उत्साहात कसे जगावे याचे ज्ञान रोजच मिळत असते. ते पण आपले गुरु असतात.

अशा या सगळ्या गुरूजनांना आज मनापासून आपण नमस्कार करूया आणि त्यांचे आशीर्वाद सतत आपल्या पाठीशी राहावेत याकरता देवाकडे प्रार्थना करूया.

आणि फक्त आजच नाही, तर यापुढे रोजच या सर्व गुरुजनांना आपण वंदन करूया आणि त्यांचे आशीर्वाद रोज नियमितपणे घेऊया आणि मस्त जगूया /आनंदाने जगूया /उत्साहाने जगूया…..

रोज सकाळी उठल्यावर खालील श्लोक म्हणायचा आणि वरील सर्व गुरुजनांना डोळ्यासमोर चलचित्रपटाच्या स्वरूपात बघायचं, नमस्कार करायचा आणि दिवस सुरू करायचा…

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः।

गुरुर्साक्षात परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः।।

(७१ वर्षांपूर्वी मी जेव्हा शाळेमध्ये पहिलीत गेलो तेव्हा श्री बोर्डे गुरुजी हे मला पहिली ते तिसरी शिक्षक होते. चौथीमध्ये श्री ठाकरे हे गुरुजी होते. पाचवी नंतर श्री मजलीकर हे गुरुजी होते. कॉलेजमध्ये डॉक्टर छबलानी प्रोफेसर होते. पुण्याला नोकरी लागल्यानंतर डिपार्टमेंटचे मुख्य श्री भाटवडेकर साहेब होते. यांच्याकडून आणि इतर सगळ्याच यांच्या सहकाऱ्यांकडून मला खूप काही शिकायला मिळाले. त्यांना त्रिवार वंदन करतो)

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ६४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ६४ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- बँकेत जायला बाहेर पडलो तरी मनात गर्दी होती ती त्या मूर्तीच्या बाबतीतल्या असंख्य विचारांचीच आणि त्या विचारांना लगडलेले होते तारामावशीच्या संदर्भातले महत्त्वाचे धागेदोरे..! )

खरंतर मी आधी म्हटलं तसं बाबांनी मला पंचवीस वर्षांपूर्वी आशीर्वाद म्हणून दिलेल्या फोटोचे हे हुबेहूब मूर्तीरूप नेमक्या वेळी आश्चर्यकारक अशा योगायोगाने मला मिळणे हा माझ्यासाठी एक चमत्कारच होता. त्यामुळेच तो चमत्कार नेमका कसा घडला याबाबतचे औत्सुक्य माझ्या मनात निर्माण होणं सहाजिकच होतं. आणि त्या औत्सुक्यपूर्तीसाठीचा एक महत्त्वाचा धागा जाऊन पोचत होता तो अर्थातच माझ्या तारामावशीपर्यंत. तिला समक्ष भेटून तिच्याशी सविस्तर बोलणं हाच त्यासाठी एकमेव मार्ग होता. कारण त्याकाळी मोबाईलच काय घरोघरी टेलिफोनही नव्हते. पत्रोपत्री याबाबत चर्चा करणे संयुक्तिक नव्हते आणि तातडीने मुंबईला जाऊन तिची समक्ष भेट घेऊन तिच्याशी बोलणे माझ्या बदलीनंतरच्या प्रचंड व्यस्ततेत लगेच शक्य होणार नव्हते. त्यामुळे एकदा नवीन रुटीन सुरळीत सुरू झालं कीं जास्तीत जास्त लवकर मुंबईला जाऊन तिची भेट घ्यायची असं ठरवून नाईलाजाने मी मनातला तो कप्पा कांही काळाकरता बंद करून ठेवला. ही तारामावशी म्हणजे माझ्या आईची मामेबहीण. पूर्वीच्या काळी आत्ते-चुलत, मामे-मावस भावंडं ही नाती खूप जवळची तर असतच आणि ती जाणीवपूर्वक जपलीही जात. त्यामुळे अशा नात्यांमधले बंधही अतिशय घट्ट, अतूट असायचे. नोकरी निमित्ताने माझं सुरुवातीचं जवळजवळ तीन वर्षांचं वास्तव्य मुंबईत असल्यामुळे मुंबईतल्या ह्या सगळ्या नातेवाईकांबरोबर वरचेवर होणाऱ्या भेटींमुळे माझेही जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झालेले होतेच. माझ्या या

तारामावशीचं संपूर्ण कुटुंबच अगत्यशील आणि आपुलकी जपणारं होतं. त्यामुळे त्यांच्याशी झालेल्या माझ्या पहिल्या भेटीतच मनातलं परकेपण विरून गेलं होतं. ती, तिचे यजमान आणि दोन मुली असं ते भिडे कुटुंब. माझ्या सख्ख्या मावशीच्या घराइतकंच डोंबिवलीतलं माझं तितकंच जवळचं विसाव्याचं ठिकाण म्हणजे माझी तारामावशी!

मुंबईहून माझी कोल्हापूरला बदली झाली तेव्हा मला निरोप देताना तारामावशी म्हणाली होती, “कोल्हापूर म्हणजे आमच्या वाटेवरचंच की रे. वर्षातून एकदा ग्रामदेवतेच्या उत्सवाला आम्हा दोघांचं संगमेश्वरला जाणं होत असतंच. त्यामुळे व्हाया कोल्हापूर जाऊन तुझ्याकडे मी नक्की येणार बघ. “

मी तिला कोल्हापूरला येण्याचा आग्रह केला तेव्हा तिने मला दिलेलं हे आश्वासन!

पुढे यथावकाश माझं कोल्हापूरला बस्तान बसलं, माझं लग्न होऊन संसार सुरू झाला. नंतरच्या रूटीनमधे माझं मुंबईला जाणं फारसं झालंच नाही आणि मावशीनं माझ्याकडे येण्याचा योगही बरीच वर्षं होऊनही कधी आलाच नाही. आमच्यातला जिव्हाळा, प्रेम, आपुलकी मात्र टिकून राहिली होती ती माझ्या आईमुळे. माझी आई मुंबईतले आमचे नातेवाईक आणि आम्ही भावंडे यांच्यातला एक दूवा असायची. कारण नातेवाईकांकडील कार्याच्या निमित्ताने किंवा इतर कारणपरत्वे आईचं वर्ष दीड वर्षातून एकदा तरी मुंबईला जाणं, सर्वांना भेटणं व्हायचंच. त्यावेळी घरच्या सगळ्यांची ख्यालीखुशाली परस्परांना समजायची.

मधे अशीच कांही वर्षे उलटून गेल्यानंतर एक दिवस अचानक दारावरची बेल वाजली म्हणून दार उघडले तर दारात एक अनोळखी, वयस्कर बाई उभ्या. त्या तारामावशीचा निरोप घेऊन आल्या होत्या ते आम्ही घरी आहोत कां हे पहायला!

आयुष्यात अगदी अनपेक्षितपणे योगायोगाने घडणाऱ्या अशासारख्या गोष्टी पुढे घडू पहाणाऱ्या कांही महत्त्वपूर्ण घटनांचा पट तयार करणारे महत्त्वाचे धागेदोरेच असतात यातलं तथ्य भूतकाळाकडे तटस्थपणे पहाताना आज प्रकर्षाने जाणवतं!

तारामावशीचं माहेर मुंबईतलं ग्रॅंटरोडचं. लग्नानंतर कोल्हापूरच्या सासरी येऊन इथल्याच झालेल्या या वयस्कर बाई म्हणजे तारामावशीची सख्खी बालमैत्रीण! यावर्षी संगमेश्वरच्या उत्सवाला गेलेली मावशी न् तिचे यजमान परतीच्या प्रवासात हिचा खूप दिवसांचा आग्रह म्हणून आदल्या दिवशी आधी तिच्याकडे उतरले होते आणि आजची रात्र आमच्याकडे राहून ते दोघे महालक्ष्मीने उद्या मुंबईला परतणार होते. ऐनवेळी येऊन घर बंद असेल तर अडचण नको म्हणून या बाई आमचा पत्ता घेऊन घर कुठं आहे ते पहायला आल्या होत्या. थोडावेळ बसून, हे सगळं सांगेपर्यंत चहा झाला न् त्या जायला निघाल्या तेव्हा मीही त्यांच्याचबरोबर बाहेर पडून त्यांच्या घरी जाऊन मावशी न् काकांना आमच्याकडे घेऊन आलो.

” इतक्या वर्षांनंतर आज पहिल्यांदा आलायत आणि तेही फक्त एक रात्र रहायला. आलायत तसे थोडे दिवस रहा आता. जायची घाई कशाला? आपण उद्याचं रिझर्व्हेशन कॅन्सल करू. “

” आता आलो कीं नाही? रहायला पुन्हा येऊ. ” भिडेकाका म्हणाले. ” कालपासून हिची तब्येतही थोडी नरम आहे रे. एकदा आपण आपल्या मठीत जाऊन पडावं हे बरं. “

” का गं मावशी? काय होतंय? ” मी विचारलं.

” प्रवासाची दगदग रे. बाकी कांही नाही ” ती हसत म्हणाली. पण ते हसणं नेहमीसारखं प्रसन्न नव्हतं. मला तरी ते कांहीसं मलूलच वाटलं होतं!

त्या रात्री मावशीला खूप ताप भरला. रात्रभर ती जागीच होती. पहाटे आम्ही उठलो तेव्हा काकांनी आम्हाला हांक मारून सांगितलं. थर्मामिटर लावून पाहिलं तर एक पर्यंत ताप. कधी नव्हे ते माझ्याकडे आलेल्या त्या दोघांनी चार दिवस रहावं, आराम करावा, असं मला मनापासून वाटलं होतं, पण ते असं विचित्रपणे खरं ठरलं होतं..! सकाळी स्टेशनवर जाऊन आम्ही त्यांची रिझर्वेशन्स कॅन्सल केली. घराजवळच डाॅ. नाबर या आमच्या फॅमिली डाॅक्टरांचं क्लिनिक होतं. त्यांना दाखवलं. तो प्रवासाच्या दगदगीने आलेला साधा ताप नव्हता. विषमज्वराचं निदान झालं. त्यामुळे आता इथं आराम करणंच आवश्यक होतं. योग्य ट्रीटमेंट आणि पथ्यपाणी यामुळे लवकर गुण आला. दोन्ही मुली आणि जावई तातडीने येऊन त्या दोघांना मुंबईला घेऊन जाऊ म्हणत होते. पण अशक्तपणामुळे ताप उलटण्याची शक्यता गृहित धरून आम्ही आग्रहाने त्यांना त्यापासून परावृत्त केले. मावशीला तर इतके दिवस इथं असं पडून रहाणं जीवावर आलं होतं.

” हे बघ, नेहमी वाईटातून चांगलं शोधायचं असं तूच म्हणतेस ना? इथं कुणा परक्याच्या घरी आहेस कां तू? छान आराम कर. अशक्तपणा कमी झाला, डाॅक्टरनी परवानगी दिली की मगच मुंबई. ” आम्ही दोघांनीही तिला समजावलं.

योग्यवेळी तिची मुलगी न् जावई त्या दोघांना घेऊन गेले. आयुष्यात अशा सगळ्याच घटना, प्रसंग सहजपणे, अगदी योगायोगानेच घडल्यात असं त्या त्यावेळी वाटतं खरं पण त्यामागेही नेमका असा कार्यकारणभाव असतोच याची हा प्रसंगही प्रचीति देणाराच तर ठरणार होता. कारण हाच प्रसंग पुढे भविष्यकाळांत येणार असलेल्या एका अनोळखी वळणावर मला शुभसंकेत देणाऱ्या कलाटणीसाठी योग्य पार्श्वभूमी तयार करणारा महत्त्वपूर्ण दुवा ठरणार होता. फक्त त्याक्षणी मला त्याची कल्पना नव्हती एवढंच!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “लग्नाचे वय” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “लग्नाचे वय☆ श्री जगदीश काबरे ☆

भारतीय समाजात लग्न ही संकल्पना केवळ एक करार नाही की निव्वळ एक सामाजिक विधीही नव्हे, तर ती एका दीर्घकाळ चालत आलेल्या सांस्कृतिक मूल्यप्रणालीची मूळ प्रेरणा मानली गेली आहे. लग्न म्हणजे दोन व्यक्तींमधील केवळ शारीरिक किंवा कायदेशीर बंधन नव्हे, तर दोन कुटुंबांच्या मध्ये तयार होणारी एक संपूर्ण जीवनपद्धती. आपल्या देशामध्ये लग्न हा केवळ एक संस्कार नाही, तर ती एक संस्था आहे. मात्र हाच विवाह आणि कुटुंब संस्थेचा अर्थ, उद्देश व स्वरूप काळानुसार बदलत गेला आहे. इतिहासातील विविध टप्प्यांमध्ये विवाहसंस्थेच्या स्वरूपात, उद्दिष्टात आणि सामाजिक दृष्टीकोनात मोठ्या प्रमाणावर स्थित्यंतर झाले आहे. आधुनिक काळात तर ही स्थित्यंतरे अधिक स्पष्टपणे दिसून येतात — विशेषतः जेव्हा कोणीतरी वयाच्या पन्नाशीनंतर लग्न करण्याचा निर्णय घेतो, तेव्हा “लग्न करायचे ते फक्त मूल जन्माला घालण्यासाठीच असते, मग आता काय उपयोग?” असा प्रश्न विचारला जातो. आम्हाला मूल होऊ शकतं हे जगाला दाखवण्यासाठी आपण लग्न करतो का? नातं स्थिरावलं की मग नवीन नात्याचा स्वीकार करणं यात काय गुन्हा आहे? आणि लग्नासारखी जबाबदारी घेणाऱ्यांना याही जबादारीची जाणीव नसेल कशी? मग ती कधी घ्यायची ते ठरवू देत की ज्यांच त्यांना. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, परिस्थिती वेगळी, त्यानुसार घ्यायला लागणारे निर्णयही वेगळे मग असं असताना लोकं लगेच मतं लादायला, शिक्के मारायला का सुरुवात करतात? हा प्रश्न विचारणाऱ्या मानसिकतेचा उगम, त्यामागील पारंपरिक दृष्टिकोन, आणि त्यावर आधारित साचलेली मूल्यसंस्था यांचा अभ्यास करणे आवश्यक ठरते.

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येते की, आर्ष काळामध्ये स्त्री-पुरुषांमधील संबंध हे भाऊ-बहीण बाप-मुलगी अशा नात्यातही होत होते, असे इतिहासाचार्य वि का राजवाडे यांनी दाखवून दिलेले आहे. त्या पुस्तकातील यम-यमी या बहिणभावांचा लैंगिक संबंधासंबंधीचा संवाद प्रसिद्धच आहे. पूर्वीच्या टोळी जीवनामध्ये मातृसत्ताक पद्धती होती. एक स्त्री अनेक पुरुषांबरोबर रत होत असे. त्यामुळे मुले फक्त स्त्रीचीच समजली जात असत. पण शेतीचा शोध लागल्यानंतर स्थिर जीवन पद्धतीत जमिनीच्या वारसांचा प्रश्न निर्माण झाला आणि मातृसत्ताक पद्धती हळूहळू पितृसत्ताक पद्धतीत रूपांतरित व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर वेदकाळापासून आजवर ही संस्था सामाजिक रचना व मानवी संबंध यांचे एक प्रमुख केंद्र राहिली आहे. वेदांमध्ये विवाह हा ‘सहधर्मचारिणी’ संकल्पनेवर आधारित होता. पुरुष व स्त्री यांनी एकमेकांचे सहकारी होऊन जीवनाचे सर्व टप्पे पार करावेत, असा हेतू यामागे होता. मात्र, कालांतराने या संस्थेचे स्वरूप अधिकाधिक पितृसत्ताक होत गेले, स्त्रियांना दुय्यम स्थान मिळत गेले. स्त्रीला फक्त उपभोग्य आणि वंश सातत्याला उपयुक्त असलेली वस्तू समजण्यात आले. म्हणून विवाह म्हणजे स्त्रीचा ‘कन्यादान’ करून तिला पतीच्या अधीन करणे, ही रुढी निर्माण झाली. संतती हे विवाहाचे केंद्रबिंदू बनले. अगदी शंभर वर्षांपूर्वी पर्यंतच्या लग्नपत्रिकांमध्ये ‘अमुक अमुकचे तमुक तमुकशी शरीरसंबंध करण्याचे योजिले आहे’, असे शब्दप्रयोग केले जात असत. म्हणजे लग्न ही कायदेशीररित्या सेक्स करण्यासाठी आणि मुलं जन्म घालण्यासाठी निर्माण झालेली संस्था होती, असा समज सर्वत्र होता आणि काही प्रमाणात आजही आहेच. पतीपत्नीत समता असावी, हा विचार फारसा कोणाच्या खिजगणतीतही नसे. परिणामी, मूल होत नसल्यास स्त्रीवर दोषारोप होणे, तिला वांझ ठरवून समाजातून बहिष्कृत करणे ही क्रूर प्रथा समाजात रूढ झाली. विवाह म्हणजे वंशवृद्धीचे साधन हे समीकरण इतके खोलवर रुजले की, ते अनेक पिढ्यांनंतरही ढळले नाही. म्हणून अनेकदा स्त्रीला जर मूल होत नसेल तर नवरा बिनदिक्कतपणे दुसरे लग्न करतो.

असे असले तरी काळाच्या ओघात, विशेषतः १९व्या व २०व्या शतकात भारतीय समाज सुधारकांनी या मूल्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. आंबेडकर अशा व्यक्तींनी स्त्री-पुरुष समतेसाठी आणि विवाहसंस्थेच्या नैतिक पुनर्रचनेसाठी लढा दिला. विधवा विवाह, आंतरजातीय विवाह, बालविवाह बंदी, स्त्रियांना शिक्षणाचा हक्क, घटस्फोटाचा अधिकार या गोष्टी त्यामधून शक्य झाल्या. यामुळे विवाह ही केवळ मूल जन्माला घालण्यासाठी असलेली गोष्ट नसून, दोन व्यक्तींमधील समज, प्रेम, सहकार्य आणि आत्मिक संवाद यांचे केंद्र आहे, ही जाणीव समाजात रुजू लागली. तथापि, आजही अनेक समाजघटकांमध्ये, विशेषतः ग्रामीण भागात किंवा पारंपरिक मानसिकता असलेल्या घरांमध्ये विवाहाच्या उद्देशाबाबत तीच जुनाट धारणा आढळते. “लग्न केवळ संततीसाठी” ही संकल्पना इतकी खोलवर रूजलेली आहे की मूल होणे शक्य नसलेल्या जोडप्यांकडे सहानुभूतीने न पाहता त्यांच्याकडे दोषारोपाने पाहिले जाते. हीच मानसिकता वयाच्या पन्नाशीनंतर लग्न करणाऱ्या व्यक्तींना अनुभवावी लागते. “आता वय काय राहिलंय? मूल होणार नाही, मग लग्न करून काय उपयोग?” हा प्रश्न त्यांच्या दिशेने सर्रास फेकला जातो. मात्र, असा विचार करताना लग्नामागील सर्वांगीण उद्देशांचा विचारच केला जात नाही.

माणूस केवळ जैविक गरजांसाठी लग्न करत नाही. एकाकीपणा, मानसिक आधार, संवाद, सहवास, आणि सामाजिक सुरक्षा या सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या गरजा आहेत. पन्नाशीनंतर, अनेक जण एकटे पडलेले असतात, काहींचे घटस्फोट झालेले असतात, काही विधुर अथवा विधवा असतात, काही जण अपत्यांपासून वेगळे राहत असतात. अशा परिस्थितीत एक समवयस्क, समजूतदार, आणि आधार देणारा जोडीदार मिळणे म्हणजे जीवनाची एक नवी संधी असते. हे लग्न एखाद्या तरुण वयातील भावनिक उन्मादामुळे झालेले नसते; तर ते परिपक्व, आत्मपरीक्षण केलेल्या आणि आपली गरज स्पष्टपणे जाणलेल्या व्यक्तींचे निर्णय असतात. या वयातील लग्नामागे शारीरिक आकर्षणापेक्षा मानसिक, भावनिक आधार आणि जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात सुखदुःख वाटून घेण्याची भावना अधिक महत्त्वाची असते. काही वेळा या जोडप्यांमध्ये दोघेही आपल्या आयुष्यातील अनेक संघर्ष पार केलेले असतात. त्यांना प्रेम आणि सहवास या शब्दांचे अधिक खोलार्थ ठाऊक असतात. म्हणून ते अपेक्षा ठेवत नाहीत, पण एकमेकांसोबत राहतात. ते मागणी करत नाहीत, पण समजून घेतात. ही परिपक्वता समाजाने ओळखली पाहिजे.

परंतु दुर्दैवाने, समाज अजूनही अशा लग्नांकडे संशयाच्या नजरेने पाहतो. विशेषतः जर स्त्रीने पन्नाशीनंतर दुसरे लग्न केले तर तिच्यावर अनेक अपमानास्पद टिप्पण्या केल्या जातात. “इतक्या वयात हे शोभतं का?”, “मुलांना काय तोंड दाखवणार?” अशा वाक्यांनी तिच्या निर्णयाला उठवळ ठरवले जाते. पती गमावलेली स्त्री एकटी राहून कर्तव्यपूर्ती करताना समाजाला अभिमान वाटतो, पण तीच स्त्री स्वतःच्या गरजांसाठी निर्णय घेतल्यास तिला अश्लील, आत्मकेंद्रित समजले जाते. हे दुहेरी मापदंड स्त्रियांना शोषणाच्या चक्रातून बाहेर येऊ देत नाहीत. या संदर्भात, विवाह म्हणजे केवळ संततीसाठी नव्हे, तर सोबत मिळवण्यासाठीदेखील असतो, हे समजणे अत्यंत गरजेचे आहे. वृद्धापकाळात भावनिक संवाद, दैनंदिन आयुष्यातील सहभागीपणा, आजारपणात आधार देणारा व्यक्ती, या सगळ्या गोष्टी जीवन सुसह्य बनवतात. याचे महत्त्व त्या लोकांना अधिक कळते जे एकाकी राहून मानसिक खिन्नतेचा अनुभव घेत असतात. मानसिक आरोग्याचा विचार केल्यास, अशा जोडप्यांना समाजाने प्रोत्साहन द्यायला हवे.

आजकाल विवाहसंस्थेचे स्वरूपही बदलले आहे. प्रेमविवाह, आंतरजातीय विवाह, समलैंगिक विवाह, लिव्ह इन रिलेशनशिप, या गोष्टी समाजात नुसत्या चर्चेपुरत्याच सीमित राहिलेल्या नसून प्रत्यक्षात असे संबंध घडताना दिसत आहेत. अनेक जोडपी विवाह न करताही एकत्र राहण्याचा निर्णय घेत आहेत. काहीजण मूल नको असेही ठरवतात, तर काहीजण मूल दत्तक घेतात. ही सगळी स्थित्यंतरे विवाहसंस्थेचा मूळ हेतू ‘केवळ मूल जन्माला घालणे’ नव्हे, तर परस्पर सहजीवन आहे, हे अधोरेखित करतात. आजची पिढी शिक्षित आहे, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे आणि मानसिकदृष्ट्या अधिक सजग आहे. त्यामुळे ती विवाहाकडे एक विकल्प म्हणून पाहते, बंधन म्हणून नव्हे. ही पिढी सहजीवन, एकमेकांप्रती आदर आणि भावनिक आधार या गोष्टींना अधिक प्राधान्य देते. परिणामी, केवळ मूल व्हावं म्हणून लग्न करायचं, किंवा मूल होणार नाही म्हणून लग्न नको, हा विचार त्यांना कालबाह्य वाटतो. शिवाय, विज्ञान व वैद्यकीय प्रगतीमुळे आज पन्नाशीच्या पुढेही मूल होणे शक्य आहे. पण मुद्दा केवळ मूल होऊ शकते का याचा नाही. मुद्दा असा आहे की मूल होणं ही विवाहाची अपरिहार्य गरजच का असावी? काही जोडप्यांना मूल नको असते, असा त्यांनी त्यांच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घेतलेला असतो. काही जोडप्यांना मूल होऊ शकत नाही; पण त्यांचे नातेसंबंध अत्यंत दृढ असतात. काही जोडप्यांना आयुष्याच्या उत्तरार्धात सुखदुःख साथ देणारा सहचर हवा असतो, ते त्यांचं वैयक्तिक आणि भावनिक स्वातंत्र्य असतं. या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यास, लग्नाच्या व्याख्येचे बंधन सैल होते आणि अधिक मानवी दृष्टिकोनातून आपण या संस्थेकडे पाहू शकतो.

थोडक्यात, पन्नाशीनंतर केलेलं लग्न म्हणजे मूर्खपणा नाही, तर एक समजूतदार निवड आहे. ती निवड समाजाने मान्य केली पाहिजे, तिचा आदर केला पाहिजे. कारण, एकटेपणा, मानसिक खिन्नता, आणि सामाजिक उपेक्षा या समस्यांना सामोरे जाण्यापेक्षा परस्पर सहजीवनाचा मार्ग अधिक सुसंवादी आहे. आजच्या काळात, विवाह ही व्यक्तिनिष्ठ, परिपक्व निर्णय घेणाऱ्या व्यक्तींची संकल्पना आहे. ती केवळ अपत्योत्पत्तीची संस्था न राहता, मनुष्यस्वभावाच्या गूढतेचा एक भावनिक व सामाजिक प्रतिसाद आहे. म्हणूनच, वय कितीही असो, लग्नाची गरज कितीही वेगळी असो, ती गरज खरी असेल, परिपक्व असेल, तर त्या लग्नाला अर्थ आहे आणि त्या अर्थाला समाजानेही मान्यता द्यायला हवी. तुम्हाला काय वाटते?

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares