मराठी साहित्य – विविधा ☆ “प्रेमाचा सप्ताह…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ 🌹 प्रेमाचा सप्ताह 🌹 ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

चौदा फेब्रुवारी हा दिवस म्हणजे प्रेमाच्या सप्ताहातील शेवटचा पण सगळ्यात महत्वपूर्ण दिवस.व्हँलेंटाईन डे . हा दिवस सगळी मनाने आणि वयाने तरुण असणारी मंडळी कुणी उघडउघड तर कुणी मनोमन साजरा करतोच.

प्रेमात पडायला ना वयं लागतं ना रंगरुप. प्रेमात पडतेवेळी सगळीकडे ,सर्वत्र,चारोओर सदाबहार वातावरणच भासतं.तारुण्य हवचं असं काहीही नसतं,वयानं नसलं तरी मनानं चालतं.रंगरुपाची तर बातच सोडा कारण प्रेमात पडलेल्यांना सगळचं सुंदरच दिसतं.

प्रेम ह्या शब्दाची व्याप्तीच खूप मोठी हो. प्रेम शब्द उच्चारल्यावर लगेच भुवया उंचावल्या जाण्याचं सहसा आपल्याकडे वातावरण. पण प्रेमात पडणं म्हणजेच काय तर ज्या व्यक्तीवर, गोष्टीवर,वस्तुवर आपण मनापासून प्रेम करतो म्हणजे ती गोष्ट आपल्याला मनापासून आवडणं

जवळपास अवतीभवती सतत हवीहवीशी, वावरावीशी वाटणं,तिचं अस्तित्व कायम मनाच्या कप्प्यांमध्ये सुरक्षित असणं,कुठलाही निर्णय घेतांना सल्ल्यासाठी त्या व्यक्तीची हटकून आठवण येणं.पावलोपावली त्या व्यक्तीला आतल्या आवाजाने मनापासून पुकारणं अथवा आपल्या व्यक्तीने आवर्जून घातलेल्या सादेला अगदी समरसून प्रतिसाद देणं,इतकी साधीसोप्पी प्रेमाची परिभाषा असतांना आपणचं त्याला वेगळं वळणं देऊन जरा क्लिष्ट आणि आडवळणाचं बनवतो बघा.

प्रेम म्हणजे प्रेम असतं,

जरी तुमचं आमचं सेम असतं,

तरीही काहीतरी वेगळेपण त्यात असतचं ।।

 

प्रेम म्हणजे काहींच्या मते त्यागात,

तर काहींच्या मते उपभोगात असतं,

असं हे प्रत्येकाचचं वेगवेगळं गणित असतं.।।

 

प्रेम हे काहींच्या मते अपेक्षा करण्यात असतं,

तर काहींच्या मते ते अपेक्षा पुरविण्यात असतं,

हे करणं वा पुरवणं दोन्हीही तसं रास्तच असतं,

असं हे प्रेमाचं समीकरणचं वेगवेगळं असतं.।।

 

प्रेम हे रोजच्या देखभालीत असतं,

तसचं ते लांबून काळजी घेण्यातही असतचं,

देखभाल असो वा काळजी करणं हे

वेगवेगळ्या त-हेनं शेवटी जीव लावणचं असतं।

 

प्रेम हे काहींच्या मते जवळीकेत असतं,

कधी प्रेम दुरून अनुभवण्यात पण असतं,

प्रेम हे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या व्याख्येत बसतं।

 

काहींच्या मते प्रेम हे घेण्यात असतं,

तर काहींच्या मते मनापासून ते देण्यातच असतं,

अश्या ह्या देवाणघेवाणीचं तंत्रच वेगळं असतं.।

 

म्हणून खरचं प्रेम हे प्रेमच असतं,

जरी तुमचं आमचं सेम असतं,

तरीही प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून ते वेगवेगळं

भासतं, कधी वेगवेगळं पण भासतं।।

 

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – विविधा ☆ पुस्तके जपा-आयुष्य जपा ☆ श्री उमेश सूर्यवंशी ☆

श्री उमेश सूर्यवंशी

परिचय  

उमेश मुरलीधर सूर्यवंशी, कोल्हापूर.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अंधश्रद्धा निर्मूलन समिती याच्या मार्फत होणा-या सामाजिक व राजकीय चळवळीत सक्रिय सहभाग.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रचे तीन वर्षे सहसंपादक म्हणून काम केले आहे. वाचकांचा पत्रव्यवहार या सदरातून 500 हून अधिक पत्रे प्रकाशित. सोशल मिडियावर विविध विषयांवरील 22लेखमाला प्रसिद्ध. तसेच विविध विषयांवरील व्याख्याने देऊन समाज प्रबोधन चालू आहे.

राजर्षी, निर्भय, बाईपण, विचार शलाका, एकटा ही पुस्तके प्रकाशित.

? विविधा ?

☆ पुस्तके जपा-आयुष्य जपा ☆ श्री उमेश सूर्यवंशी 

शब्दांच्या महाजालात खूप काही गहिरे अर्थ दडलेले असतात. त्या अर्थाचा पायपोस देखील आपल्या जीवनात अथवा वर्तनात घडत नाही ही शोकांतिका आहे. शब्दाच्या अर्थाची जाणीव झाली तरच तो शब्दार्थ व्यवहारात उमटवण्याची ऊर्मी मनांत जागू शकते. हे शब्द एकत्रित व व्यवस्थित एका दिशेने बांधून एका ठराविक चौकटीत तयार होते ते असते ” पुस्तक “. मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचा असा शब्द आहे ..पुस्तक .

पुस्तक ….बहुतांशी हातात आयुष्यात एकदा तरी कोणते ना कोणते पुस्तक पडलेले असते. भले ते अभ्यासक्रम असणारे पुस्तक असेल अथवा एखादे रद्दीत टाकलेले किंवा अडगळीत पडलेले पुस्तक असेल. अभ्यासक्रम मधील पुस्तक जितके महत्त्वाचे असते तितकेच रद्दी अथवा अडगळीत पडलेले पुस्तक दुर्मिळ असू शकते. त्या पुस्तक नावाच्या घटकाची मुल्यता ठरते ती त्यामधील आशयावर. तो आशय ज्यांना समजतो त्यांना पुस्तक समजले . पुस्तक वाचण्याची क्रिया ही केवळ आनंददायी नसते तर ज्ञानदायी असते. आनंद + ज्ञान ….म्हणजे पुस्तक . केवळ अभ्यासक्रमातील पुस्तकात रमलेली व्यक्ती भले जीवनात भौतिकदृष्ट्या यशस्वी होईल देखील पण अवांतर पुस्तकाचे वाचन नसेल तर त्या यशस्वी व्यक्तीच्या माणूस बनण्याची प्रक्रिया नक्कीच थांबली आहे असे निखालस समजावे. मनुष्य व प्राणी यांच्यामध्ये काही मुलभूत फरक आहेत. मनुष्य पुस्तक वाचू शकतो, आनंद घेऊ शकतो, वेगवेगळ्या ज्ञानकक्षा कवेत घेऊ शकतो. प्राण्यांना हे शक्य नसते. याचकरीता ” पुस्तके वाचतो तोच मनुष्य ” अशी व्याख्या करणे अतिशयोक्ती ठरु नये. पुस्तकांचे जग हे सर्वाधिक विश्वासाचे जग आहे….त्या जगात आयुष्य शोधता आले पाहिजे .

पुस्तके नसतीत तर ?…केवळ या कल्पनेनेच मानवी जीवनातील रसहिनतेची, अज्ञानपणाची जाणीव तयार होते. पुस्तक हाती धरणे जितके महत्त्वाचे असते तितकेच महत्त्वाचे ते पुस्तक समजून घेऊन आपल्या मेंदूमध्ये त्या पुस्तकीय जाणीवा विकसित करत राहणे अत्यावश्यक असते. “वाचाल तर वाचाल ” या वाक्याचा अर्थ तसाच घ्यावा . “पुस्तके जपा…आयुष्य जपा ” हा सुसंस्कृत मानवी जीवनाचा नवा मंत्र आहे.

©  श्री उमेश सूर्यवंशी

मो 9922784065

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – विविधा ☆ बाल्य आणि पाटीपेन्सिल ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ बाल्य आणि पाटीपेन्सिल ☆ सौ. अमृता देशपांडे 

1950 ते 1970 च्या दोन दशकात जन्म घेतलेले माझ्याशी सहमत होतील. वयाच्या पाचव्या वर्षी शाळेत प्रवेश केलेली ही पिढी.

पाचव्या वर्षी पर्यंतचे लालनपालन आजी-आजोबा,  काका काकू, आत्या,  आईबाबा,  मोठी भावंडे यांच्या सहवासात होत असे. आजोळचे मातुल लोक तर खूपच लाड करायचे. तिथे रागावणे, डोळे मोठे करणे हे नसायचेच. फक्तच कौतुक आणि लाड. चारच दिवस आलेली माहेरवाशीण आणि नातवंडे आजोळच्या घराचा परमानंद होता.

लालन म्हणजे लाड आणि पालन म्हणजे पाळणे. पाच वर्षांपर्यंत घरात भरपूर लाड असायचे. मुख्य म्हणजे लवकर उठण्याची सक्ती नसे. घरातले सगळेच खाऊ द्यायला, गोंजारायला,  सतत आसपास असत.

आज्जीनं दिलेला लाडू, आईनं दिलेल्या गूळ-शेंगा,  काकानं आणलेला ऊस, बाबांनी आणलेला सुका मेवा अशा खाऊच्या लाडाकोडातलं श्रीमंत बालपण!

आजोबांची काठी,  आत्याची पर्स,  काकांच्या चपला, बाबांच्या स्कूटरच्या किल्ल्या असे ऐवज लपवणे ही त्यावेळेस आवडती खोड होती. त्यावेळी त्यांच्या मूडप्रमाणे मारही भरपूर खावा लागे.

घरची मुले कुठे आणि काय खेळाहेत,  कशानं खेळत आहेत यावर घरातल्यांचं बारीक लक्ष असे. हेच पालन! अशा प्रेमळ शिस्तीच्या  लालनपालनात आयुष्याचा पाया भक्कम व्हायचा. घराबद्दल, घरातल्या माणसांबद्दल प्रेम, आपुलकी, ओढ आणि सुरक्षितता वाटण्याचं कारण हा भक्कम पायाच आहे.

पाच वर्षांनंतर गुढीपाडव्याला पाटीपूजन केले जायचे.  नवीन वर्षाच्या सुरुवातीला शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवली जायची. पाटी आणि पेन्सिल या दोन वस्तू मुलांच्या हाती सोपविल्या जायच्या.

मुलांना एक प्रकारची जबाबदारीची जाणीव करून दिली जायची. त्यावेळी पाटीपेन्सिल हे आयुष्यातलं पहिलं साधन. पुढे वही-पेन, फळा-खडू, हे तिचे वारसदार.

पाटीवर पेन्सिलीने सरस्वती काढायची. एक एक अशा अकरा आकड्यांची.  देवासमोर पाटीपूजन करायचं. मग ती मुलांच्या स्वाधीन केली जायची. मार्च-एप्रिल मध्ये गुढीपाडवा येतो, महिनाभर पाटी जपून ठेवली जायची. कधीतरी दुपारी हळूच पाटीवर सूर्य, फूल, चांदोबा ,  झाड अशी चित्रे काढायचा प्रयत्न चालू असायचा.

जून मध्ये शाळा सुरू होते.  एका हातात डबा ( कडीचा स्टीलचा डबा)

आणि दुस-या हातात पाटी. खिशात पेन्सिलीचा तुकडा.  नवा कोरा शाळेचा ड्रेस. तो मापानं मोठाच शिवलेला, दोन वर्षांची बेगमी.  

अगदी सुरवातीला मण्यांची पाटी म्हणजे पाटीच्या अर्ध्या भागात दहा तारा , प्रत्येक तारेवर दहा, नऊ, आठ, सात असे एक पर्यंत रंगीत मणी ओवलेले.( आठवले का?) त्या मण्यांच्या मदतीने गणिताच्या दुनियेत पाऊल टाकलं.

त्यानंतर मणी नसलेली पाटी. तीही दोन आकारात उपलब्ध होती..लहान आणि मोठी. आम्हाला दुसरीच्या वर्गात लहान पाटी आणि तिसरी, चौथीला मोठी पाटी दिली गेली. आणखीही एक पाटी मिळायची, डबल पाटी.

म्हणजे दोन पाट्या जोडपट्टी लावून एकत्र केलेल्या असत. पेन्सिलीनं लिहिलेलं पुसलं जाऊ नये, म्हणून दोन्ही बाजूला पुठ्ठे ठेवले जायचे.

एक अख्खी पेन्सिल शाळेत पोचेपर्यंत अख्खी असायची, लिहायला सुरुवात केली कि, तुकडे कधी व्हायचे ते कळतच नव्हते. मग ते तुकडे लिहून संपेपर्यंत नवी मिळायची नाही. त्यावेळी एकमेकांना पेन्सिलीचे तुकडे देऊन  मदत करण्यात खूप आनंद वाटायचा.

पेन्सिलीचा षटकोनी आकार इतका योग्य कि चिमुकल्या बोटांतली शक्ती गरजेपुरतीच लागेल, इतका विचार करून निर्मात्यांनी तयार केली असे.

अंगठा, तर्जनी आणि मधले बोट या त्रयींची पेन्सिलीशी दोस्ती झाली की पाटीवर अक्षरे व अंक डौलदारपणे उतरत. या तीन बोटांचा संबंध थेट मेंदूशी होऊन तिथल्या पेशी तरतरीत होऊन अपेक्षित परिणाम पाटीवर दिसे. अॅक्युप्रेशर हा शब्द खूप नंतर कळला. त्यावेळच्या शिक्षण तज्ञांनी इतक्या लहान वयाच्या मुलांच्या शारिरीक व मानसिक क्षमतेचा सर्वांगाने विचार करून ही पद्धत आचरली असणार.

पाटी सांभाळणे म्हणजे लिहिलेले पुसले जाणार नाही  आणि पाटी फुटणार नाही याची काळजी घेणे,  पेन्सिलीचे तुकडे सांभाळणे ही जबाबदारी पाच ते नऊ वर्षाच्या बालकांवर होती .

पाटीवर लिहिल्याने अक्षर वळणदार आणि टपोरे होते, हे मात्र खरं!!

चौथीतून पाचव्या इयत्तेत गेल्यावर पाटी पेन्सिल चा निरोप घेऊन वही पेन यांची ओळख होत असे.

त्या बालवयातलं बालगीत ” शाळा सुटली पाटी फुटली,  आई मला भूक लागली ” हे गाणं प्रत्येक बालकाच्या मनातलं होतं.

कालानुरूप ते बालवयही मागे पडले,  त्याबरोबरच पाटीपेन्सिल ही कालबाह्य झाली.

इतका मोठा बदल होईल, अशी कल्पना ही कुणी केली नसेल.

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग – ५६ – आपलेच झाले परके ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग – ५६ – आपलेच झाले परके डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

अमेरिकेत मत्सराचा अग्नी कसा भडकला होता ते आपण पाहिले. जे लोक जागतिक स्तरावर सर्व धर्म भेद ओलांडण्याचा विचार मांडत होते ते यात सहभागी होते हे दुर्दैवच म्हणायचे. भारतात सुद्धा त्याची री…ओढत हिंदू धर्म कसा संकुचित व बुरसटलेला आहे, हे ओरडून सांगितले जात होते. पण स्वामी विवेकानंद मात्र हिंदू धर्मातील प्राचीन ऋषींचे उदात्त विचार परदेशात समजावून देत होते. त्यात कुठल्या धर्माची सीमा आडवी येत नव्हती. वा देशाची नाही. हिंदू धर्माचं हे वैशिष्ट्य आज पण आपण माहिती करून घेणं आवश्यक आहे.

भारतात प्रसिद्ध झालेले विवेकानंद यांच्या विरोधातले लेख अमेरिकेत पुन्हा प्रसिद्ध केले जात. हे लेख तिथल्या ‘लॉरेन्स अमेरिकन’, ‘आऊटलुक’ आणि ‘डेट्रॉईट फ्री प्रेस’ मध्ये छापून आल्याने सगळ्या लोकांना वाचायला मिळत असत. या विषारी प्रचारामुळे लोक दुरावत चालले होते. परिषदेवेळी मित्र झालेले डॉ.बॅरोज बोलेनसे झाले. एव्हढा सतत प्रचार वाचून प्रा. राईट सुद्धा थोडे साशंक झाले. हे बघून विवेकानंद अस्वस्थ झाले. होणारच ना. कलकत्त्यात इंडियन मिरर या वृत्तपत्रात याचा प्रतिवाद होत असायचा. यात विवेकानंद यांच्या कार्याचे वर्णन, परिषदेची माहिती, चर्चा, त्यांनी मिळवलेले यश हे सर्व छापून येत होतं. माध्यमे कसं जनमत घडवतात याचं हे उत्तम ऊदाहरण आहे. म्हटलं तर चांगल्या कामासाठी माध्यमांचा खूप चांगला उपयोग आहे पण वाईट कामांना किंवा विघातक कामाला प्रसिद्धी देऊन खतपाणी घालणे हे समाजाला अत्यंत घातक आहे. पण भारतात. जगातल्या प्रसिद्धी माध्यमांची ओळख भारतीय लोकांना नव्हती. त्यामुळे इथे आलेली वृत्त अमेरिकेतल्या लोकांनाही  अधिकृतरीत्या कळावित असे कोणाच्या लक्षात आले नाही. कलकत्त्यात ‘इंडियन मिरर’ मध्ये १० एप्रिल १८९४ या दिवशीच्या अग्रलेखात विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले होते.ते असे होते, “अमेरिकेला जाऊन हिंदू धर्माचा एक प्रवक्ता म्हणून विवेकानंदांनी जे नेत्रदीपक यश मिळवले आहे, त्याबद्दल त्यांना एक सन्मानपत्र लिहून आपली कृतज्ञता व्यक्त करणे हे हिंदू समाजाचे कर्तव्य आहे. ज्यांनी सर्वधर्म परिषदेचे आयोजन केले त्या अमेरिकन लोकांचेही आपण कृतज्ञ असावयास हवे. कारण त्यांनी त्या परिषदेच्या निमित्ताने विवेकानंदांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले, त्यामुळे, त्यांना आपले पुढील कार्य करण्यासाठी पाया भरता आला”. विवेकानंद यांना जे अपेक्षित होते तेचं यात म्हटले होते, पण हा मजकूर त्यांच्या हातात नव्हता. तसाच मधेच बोस्टन मध्ये भारतातील आलेला मजकूर छापला होता ते कात्रण मिसेस बॅगले यांनी विवेकानंद यांना पाठवले. त्याबरोबर बोटभर चिठ्ठी सुद्धा नव्हती यावरून त्यांची गंभीरता लक्षात आली. उत्तम परीचय झालेली ही मोठ्या मनाची लोकं, त्या क्षणी अशी वागली याचे स्वामीजींना किती दु:ख झाले असेल.

आता हे सारं त्यांना असह्य होत होतं. शेवटी त्यांनी एक मार्ग निवडला आणि त्याबद्दल मद्रासला आलसिंगा आणि कलकत्त्याला गुरुबंधूंना पत्र पाठवले. त्यात लिहिले होते,  मद्रास व कलकत्त्यात दोन सार्वजनिक सभा घ्याव्यात, त्यात नामवंतांचा सहभाग असावा. त्यांनी विवेकानंद यांच्या कार्याची पावती देणारी प्रतींनिधिक भाषणे व्हावीत, अभिनंदन करणारा ठराव संमत करावा, आणि अमेरिकेतील लोकांना धन्यवाद देणारा दूसरा ठराव असावा. या सभांचे वृत्त भारतीय वृत्त पत्रात प्रसिद्ध व्हावे. आणि त्यांच्या प्रती इथे अमेरिकेत डॉ बॅरोज आणि प्रमुख वृत्तपत्रांचे  संपादक यांना पाठवावीत अशी विनंतीपर पत्र पाठवली.

स्वत:ची प्रसिद्धी हा भाग यात नव्हता. पण हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून जी लोकं त्यांच्या बरोबर आदराने उभी होती, मदत करत होती त्यांच्या मनातून संदेह निर्माण झाला तर केलेल्या कामावर पाणी चं फिरणार ही भीती होती. कारण हिंदू धर्माची ध्वजा एका चारित्र्यहीन माणसाने हातात घेतली आहे असे चित्र तिथे रंगविले जात होते. हा ध्वजाचा अपमान होता. मिशनर्‍यांचा काही भरवसा राहिला नव्हता.  काय करतील ते सांगता येत नाही अशी परिस्थिति उद्भवली होती.

डेट्रॉईट मध्ये आयोजित एका भोजन समारंभात घडलेला प्रसंग यावेळी विवेकानंद यांनी कॉफीचा पेला उचलला तर त्यांना आपल्या शेजारी एकदम श्रीरामकृष्ण उभे असल्याचे दिसले, ते म्हणत होते, “ ती कॉफी घेऊ नकोस, त्यात विष आहे. विवेकानंदांनी एक शब्दही न बोलता तो कॉफीचा पेला खाली ठेवला. अशी आठवण गुरुबंधुनी सांगितली आहे. यावरून केव्हढी गंभीर परिस्थिति तिथे झाली होती याची कल्पना येते. एका सर्वसंग परित्यागी  संन्याशाला स्वत:च्या अभिनंदनाचे ठराव करून अमेरिकेत पाठवावेत असे स्वत:च लिहावे लागले होते. यामुळे त्यांच्या मनाची काय अवस्था व किती घालमेल झाली असेल ?

त्यांनी जुनागड चे दिवाण साहेब, खेतडी चे राजे, यांनाही पत्र लिहिली. मेरी हेल यांनाही पत्र लिहून आपल मन मोकळं केलं. सर्वधर्म परिषदेचं महाद्वार ज्यांनी आपल्यासाठी उघडलं होतं त्या प्रा. राईट यांच्या मनात तरी आपल्याबद्दल संशयाची सुई राहू नये असे विवेकानंद यांना वाटत होते. ती दूर करणं आपलं नैतिक कर्तव्य आहे असेही त्यांना वाटले म्हणून त्यांनी तसे पत्र राईट यांनाही लिहिले. ते लिहितात, “ मी धर्माचा प्रचारक कधीही नव्हतो, आणि होऊ ही शकणार नाही. माझी जागा हिमालयात आहे, माझ्या मनाला एक समाधान आहे की, माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून मी परमेश्वराला म्हणू शकतो की, हे भगवन, माझ्या बांधवांची भयानक दैन्यवस्था मी पहिली, ती दूर करण्यासाठी मी मार्ग शोधला, तो प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मी पराकाष्ठेचा प्रयत्न केला. पण माला यश आले नाही. तेंव्हा तुझी इच्छा असेल तसे होवो”. तर मिसेस हेल यांना विवेकानंद लिहितात. “या सार्वजनिक जीवनाला आपण कंटाळून गेलो आहोत. माताजी तुमच्या सहानुभूतीचा मला लाभ होईल? शेकडो बंधनांच्या ओझ्याखाली माझे हृदय आक्रंदत आहे”.

दरम्यान विवेकानंद यांच्या हातात जुनागड चे हरिभाई देसाई आणि खेतडीचे अजित सिंग यांची पत्रे आली. लगेच ती प्रा. राईट यांना पाठवली.

अगदी एकाकी पडले होते ते. महिनाखेरीस विवेकानंद हेल यांच्या कडे आले. या सर्व घटनांनी ते अतिशय थकून गेले होते. शरीराने नाही तर मनाने.याचवेळी हेल यांना एक अनामिक पत्र आले की, विवेकानंद यांना तुमच्या घरी ठेऊन घेऊ नका म्हणून, हा एक खोटा आणि चारित्र्यहीन माणूस आहे. हेल यांनी हे पत्र घेतले आणि फाडून, तुकडे करून पेटत्या शेगडीत टाकले.

प्रतापचंद्र यांची मजल तर श्री रामकृष्ण यांच्यावरही प्रतिकूल शब्दात टीका करण्याचे सोडले नव्हते. वास्तविक त्यांनी नरेंद्रला या आधी पहिले होते रामकृष्ण यांच्यावर तर श्रेष्ठत्व सांगणारा सुंदर लेख लिहिला होता. एकदा संध्याकाळी मेळाव्यात प्रतापचंद्र बोलत असताना श्रीराम कृष्ण आणि विवेकानंद यांच्याबद्दल निंदा करणारे काही बोलले.

हे दीड दोन महीने जणू काळ रात्रच होती स्वामीजींसाठी. पण ती आता संपत आली होती. नवा सूर्य उगवणार होता आणि मनातल्या व्यथा नाहीशा होऊन क्षितिजावर प्रसन्नता प्रकाशमान होणार होती. 

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – विविधा ☆ निदा फाजली ☆ श्री मिलिंद रतकंठीवार ☆

? विविधा ?

☆ निदा फाजली ☆ श्री मिलिंद रतकंठीवार ☆

(दि. नऊ फेब्रुवारी हा कवी निदा फाजली यांचा स्मृतिदिन. त्यानिमीत्त त्यांच्या विषयी रेखाचित्रकार श्री.मिलिंद रतकंठीवार यांनी लिहीलेला लेख: निदा फाजली)

निदा चा शाब्दिक अर्थ म्हणजे स्वर किंवा आवाज. खरे त्यांचे पाळण्यातील नाव हे मुक्तिदा (मुक्तीदाता तर नव्हे ?) हसन पण त्यांनी स्वीकारलेले टोपण नाव म्हणजे निदा… आणि फाजली हे काश्मीर मधील एका गावाचे नाव.. असे असले तरीही, त्यांची प्रतिभा ही सर्वांना कवेत घेणारी सार्वत्रिक होती, वैश्विक होती. त्यांच्या पत्नीचे नाव मालती जोशी. आणि गोड अश्या कन्येचे नाव तहरीर तहरिर चा अर्थ लिखित (प्रमाणपत्र).

त्यांच्या प्रागतिक धारणांमुळे पाकिस्तानात त्यांना गैरइस्लामिक मानत असत. त्यांच्या रचनांचा आशय, गर्भार्थ हा सर्वांच्या मानवी जीवनाला स्पर्श करणारा होता. मानवतेला साद घालणारा होता. दुनिया जिसे कहते हैं, जादू का खिलौना हैं, मिल जाए, तो मिट्टी हैं, खो जाये तो सोना हैं… धूप मे निकले हो तो, घटाओं मे नहा कर तो देखो, जिंदगी क्या हैं, किताबो को हटाकर देखो… कभी किसी को मुकम्मल जहां नही मिलता, कही जमी, तो कही आस्मा नही मिलता, होशवालो को खबर क्या, बेखुदी क्या चीज है, इश्क कीजे फिर समझिये जिंदगी क्या चीज हैं.. एक आदर्श, वस्तुनिष्ठ, संयमी, विचारवंत पण खोडकर प्रियकर त्यांचे शायरीत, दिसायचा.. त्यांची शायरी, ही मला नेहेमीच भावायची त्यांचे रेखाचित्र काढावे असे माझ्या मनात होतेच, त्यांच्याशी संपर्क साधला असता, पुण्यात त्यांच्या आगमनानंतर त्यांचा निरोप आलाच…योगायोगाने प्रसिद्ध गझल गायक आल्हाद काशीकर यांचा देखील परिचय झाला. “मै बहुत खुश हूँ, कि आपने मुझे इस काबिल समझा” ” सर, मै होता कौन हूँ? आप की शायरी ही उतना हौदा रखती हैं..” मी शक्य तितका नम्र होत म्हणालो.. एका प्रथितयश शायर शी शक्य तेवढ्या मृदू भाषेत, शक्य तेवढ्या अदबीे ने बोलण्याचा मी प्रयत्न करत होतो.. पण गतिरोधका वर वाहन जसे डचमळते तसा मी अडखळत होतो.

त्यांना पोर्ट्रेट दाखवताच, त्यांनी मनमोकळे पणाने कौतुक केले, त्यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलीला देखील बोलावून घेतले.. आणि स्वाक्षरी केली… “मै भी, मै भी” असे त्यांची छोटीशी गोड कन्या तहरीर, उडी मारत हट्ट करू लागली . मी म्हणताच तिने देखील स्वाक्षरी केली. नंतर खूप दिलखुलास गप्पा झाल्या.. अगदी मुस्लिम मन ते मोदी सरकार. धर्म ते राष्ट्र.. संस्कृती ते राष्ट्र.. अगदी पाकिस्तान सुद्धा.. “दुश्मनी लाख ही सही, खत्म ना किजे रिश्ता, दिल मिले या ना मिले, हाथ मिलाते रहीये”

असा संदेश सरते शेवटी त्यांनी दिला. आपल्या विशिष्ट शैलीत ते म्हणाले. “घर से मस्जिद है बहुत दूर, चलो यूँ कर लें, किसी रोते हुए बच्चे को, हंसाया जाये…”

त्यांच्या मृत्यूची वार्ता कळताच, त्यांच्या सारख्या विचारवंत कलाकाराला आम्ही ओळखू शकलो नाही, याची रुखरुख लागून राहिली.

नऊ फेब्रुवारी या निदा फाजली यांच्या स्मृतीदिनी त्यांचे स्मरण होणे, त्यांच्या विचारांचे स्मरण होणे.. हे नितांत गरजेचे आहे..

© श्री मिलिंद रतकंठीवार

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – विविधा ☆ “रोझ डे…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ 🌹 रोझ डे 🌹 ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

कोणत्याही दोन पिढ्यांमध्ये उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत फरक हा आपोआपच पडत जातो. त्यालाच आपण “जनरेशन गँप”असं म्हणतो. प्रत्येक पिढीतील लोकांना आपल्या पुढील पिढी जास्त सुखी, स्वतंत्र आहे असं वाटतं असतं.प्रत्येक व्यक्तीचे आपल्या स्वतःच्या पिढीला खूप सोसावं लागलं हे ठाम मतं असतं.आपल्याला पुढील पिढीपेक्षा खूप जास्त तडजोडी कराव्या लागतात असं प्रत्येकालाच वाटतं असतं हे विशेष.

ह्या निमीत्ताने तीन पिढ्यांमधील फरक मात्र स्पष्टपणे जाणवतो.आपल्या आधीची पिढी  स्पष्टवक्ती आणि जरा फटकळच. त्या पिढीतील लोकं तोंडावर सांगून मोकळे होतात त्यामुळे त्यांच्या पचनी हा “रोझडे”.वगैरे अजीबातच पडत नाही. आमची पिढी ही तळ्यातमळ्यात करणारी पिढी, ना घरका न घाटका म्हणू शकता. संपूर्णपणे विरोधही नाही ह्याला आणि सरसावून साजरा करण्याइतकं धैर्य, स्वतः चे भ मत झडझडून सांगण्याइतका मोकळेपणाही नाही. आणि ह्या उलट आत्ताची पिढी हा उत्सव साजरा करतांना आधीच्या दोन पिढ्यांच्या मतांशी काहीच देणंघेणं नसलेली पिढी.

फेब्रुवारी महिन्याची सुरवातच मुळी कडाक्याची थंडी संपलेली असते आणि उन्हाळ्याची काहीली अद्याप सुरवात झालेली नसते ,असा तो हा हवाहवासा, गुलाबी, प्लिझंट वाटणारा काळ.त्यातच फेब्रुवारी सात पासून ते चौदा फेब्रुवारी पर्यंत व्हँलेंटाईन वीक,प्रेमाचा साक्षात्कारी सप्ताह, व्हँलेंटाईन बाबाचा उत्सवच जणू.त्यामुळे हा आठवडा नव्या तरुणाई साठी वा कायम मनाने तरुणाई जपून असणाऱ्या व्यक्तींसाठी पर्वणीच.

अर्थातच हा आठवडा समारंभ म्हणून साजरा करण्याबाबत दुमत हे असतंच. काही मंडळी अगदी ह्याच्या विरुद्ध असतात तर काही मंडळी हा उत्सव  साजरा करण्यासाठी जिवाचा आटापिटा करणारी. अर्थातच प्रेमाला कुणाचाच विरोध नसतो, विरोध असतो तो साजरा करण्याच्या पद्धतीबाबत.थोडक्यात हा उत्सव म्हणजे इंग्रजी वा विलायती वासंतिक उत्सव.

ह्या आठवड्यातील पहिला दिवस म्हणजे “रोझ डे”. पिढीपिढीत खूप झपाट्याने फरक पडत चाललाय.आमच्या पिढीपर्यंत तरी काँलेजमधे वा तरुणपणात मुलंमुली एकमेकांशी बोलले तर नक्कीच काहीतरी शिजतयं हे समजण्याचा काळ.त्यामुळे हे व्हँलेंटाईन वगैरे तर आमच्या कल्पनेच्या पार पलीकडले.त्यामुळे ह्या रोझ डे ची संकल्पनाच मुळी प्रत्येक पिढीत वेगळी. देवपूजेसाठी का होईना पण आजोबा परडी भरून गुलाबाची फुलं तोडून आणतं हाच आजीचा रोजचा रोझ डे. एखादं झाडावरचं फूल हळूच बाबा फ्लावर पाँटमध्ये वा टेबलवर ठेवायचे,अर्थातच बाकी कुणाला नाही कळले तरी आईला फक्त कळायचे किंवा कुणी झाडावरचे फूल तोडून नेईल म्हणून वा गुलकंदासाठी आणलीयं फुलं असं दाखवायचे तोच आईचा रोझ डे. पुढे खूपच हिम्मत असली तरी काँलेजमध्ये ती यायच्या आत तिच्या बेंचवर गुलाबाचे फूल वा फुलाचे ग्रिटींग कार्ड लपून ठेवून जायचे हा आमच्या पिढीचा रोझ डे किंवा जास्तीत जास्त एखादा गुलाब हस्तेपरहस्ते तिच्यापर्यंत पोहोचविणारा आमच्या पिढीचा रोझ डे आणि गुलाबाचा वापर केवळ बुके आणि रोझ डे साठीच हा विचार मानणारी आणि तो बुके बेधडक देणारी आणि घेणारी सुद्धा हल्लीची ही बिनधास्त, धीट आजची पिढी.

ह्या आठवड्यातील सात फेब्रुवारी हा पहिला दिवस,” रोझ डे “.हा दिवस ह्या पिढीतील तरुणाईच्या जगतातील महत्त्वाचा दिवस तर आधीच्या पिढीच्या मते दिखाऊ प्रेम दर्शविणारी नसती थेऱ असल्याचा दिवस.

जर रोझ डे साजरा करण्याची संकल्पना सरसकट आपल्यात असती तर वेगवेगळ्या वयोगटातील, पिढीतील लोकांच्या मनात रोझ डे बद्दलचे निरनिराळे विचार काय असते वा आजच्या भाषेत हा “इव्हेंट”आपण कसा साजरा केला असता ह्या कल्पनाविलासाची एक झलक पुढीलप्रमाणे.

1…..शाळकरी रोझ डे

गुलाब दिला किंवा मिळाला तरच खूप प्रेम असतं हे मानण्याचं हे अल्लड वयं.

2…..महाविद्यालयीन रोझ डे

जगातील सगळ्यात चांगले आणि खरे प्रेम आपल्याच वाट्याला आले, त्याच्याकडूनच गुलाब मिळाला वा त्यालाच गुलाब दिला असं मानणारं हे वयं आणि प्रेम.

3…..नवविवाहितांचा रोझ डे

गुलाब आणला नाही तर फुरगटून बसायचे आणि आणला तर ह्याची चांगली प्रँक्टीस आहे वाटतं ,हे ओळखणारं प्रेम.

4…..चाळीशीतील रोझ डे

गुलाब आणल्यानंतर वरवर हे आपलं वय राहिलं का असे म्हणणारे पण मनातून,आतून मात्र खूप सुखावणारे प्रेम.

5…..पन्नाशीतील रोझ डे

आणलेला गुलाब बघून ,बरं झालं देवाला वहायला फूल झालं हे मानणारं वयं वा प्रेमं.

6…..साठीतील रोझ डे

त्या गुलाबाच्या थेरापेक्षा जर्रा बर वागायला लागा,मग रोझ डे पावेल हे मानणारं वयं वा प्रेम.

7…..सत्तरीतील रोझ डे

नुसत्या नजरेतूनच गुलाबजल छिडकून ख-या गुलाबाची गरजही न भासणारं हे वयं किंवा प्रेम.

8…..नंतरचा शेवटपर्यंतचा रोझ डे

आता च्यवनप्राश आणि त्याबरोबर ह्या गुलाबाचा गुलकंद करुन खायला घातला पाहिजे, जरातरी डोकं थंड राहायला मदतच होईल हे मानणारं वयं आणि प्रेम.

तर अशा ह्या व्हँलेंटाईन वीकमधील पहिल्या दिवसाच्या रोझ डे ला भरभरून शुभेच्छा आणि प्रत्येकाच्या आयुष्यात रोजच”रोझ डे”फुलावा ही सदिच्छा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – विविधा ☆ “तत्परता…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

? विविधा ?

☆ “तत्परता…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

नवीन आलेले फोन, आणि त्यातले संदेश, फोटो, आणि ध्वनीचित्रफीत पाठवण्याचे तंत्र याला सलाम. तत्परता म्हणजे काय? हे फोन आणि WhatsApp मुळे समजते‌‌.

या फोनमुळे व WhatsApp मुळे आम्ही आमचे तारतम्य काही प्रमाणात सोडले असा आरडाओरडा सगळ्या घरांमध्ये, सगळ्या स्तरावर, (मजल्यावर) सगळ्या खोल्यातून, सगळ्या वेळी होत असला तरी आम्ही यांचे वापरणे  सोडलेले नाही.

घरात आणि बाहेर नम्रता (मान खाली ठेवणे) आज याच मुळे आहे. त्यामुळे आम्ही (बहुतेक वेळा) खालमानेनेच वावरतो. बऱ्याचदा आता मान वर करून बोलावे लागते, त्यासाठी पूर्वी (मान वर करून बोलण्याबद्दल) खूप वेळा काही ऐकावे लागत होते. आता अगोदर मान वर कर… असे सांगावे लागते.

अगदी म्हणजे सुरू असलेल्या कार्यक्रमात सुध्दा आमचे अंगठे सतत या फोनमुळे व्यस्त असतात. आजवर दाखवण्या व्यतिरीक्त इतर कामाला क्वचितच आलेला अंगठा आता बराच वेळ बिझी असतो. मी तर तो दाखवण्यापेक्षा जास्त वेळ बघितला असेल.

अहो तत्परता तत्परता तरी किती? म्हणजे सुरू असलेल्या कार्यक्रमात आम्ही जागा दिसेल तिथून व काढता येतील तसे फोटो आणि ध्वनीचित्रफीत काढून काही सेकंदाच्या अवधीत ते पाठवून आम्ही त्या कार्यक्रमात शरीराने हजर असल्याचे पुरावे देतो. (फक्त नेटवर्क का काय म्हणतात ते नीट वर्क करायला हवे.)

परवा एका कार्यक्रमात मी बसल्याजागी (उगाचच कार्यक्रम करणाऱ्यांना अडथळा नको) चोरुन काही फोटो काढले, आणि अवघ्या काही सेकंदाची ध्वनीचीत्रफीत करून बसल्या जागेवरुनच पाठवली. (खरे सांगायचे तर रंगमंचावरील लाईट आणि कलाकाराचा नीळा झब्बा इतकेच काय ते त्यात समजेल असे दिसत होते. चेहरा कोणाचा आहे हे सांगावे लागणार होते.) पण अवघ्या काही मिनिटांतच उत्तर म्हणून पाच सहा अंगठे, दोन चार टाळ्या वाजवणाऱ्या हाताची चित्र, पाच सहा वेगवेगळे चेहरे (यांना स्माईली म्हणतात), आणि एक दोन छान दिसतंय असा आशय दाखवणारी बोटं उत्तरात परत आली.

(छान दिसतंय असा आशय दाखवणाऱ्या बोटांच्या चित्राच आणि ते पाठवणाऱ्यांच मला विशेष कौतुक वाटते. कारण त्यांना छान म्हणायचे आहे का ध्यान म्हणायचे आहे हे आपल्याला समजून घ्यावे लागते. महाभारतातील नरो वा कुंजरो वा या नंतर याच बोटांच्या खुणेचा अर्थ गहन असेल… छान की ध्यान…असो.) किती ही तत्परता… पण त्यांचा रंगमंचावर आणि आमचा फोनवर कार्यक्रम सुरू होता.

अमेरिकेवर फिरणारा तो फुगा चीनचा आहे हे समजून घेऊन त्या बद्दल अमेरिकेने चीनला विचारुन चीनने उत्तर देण्याआधीच दुरदर्शन वरुन आमच्या मोबाईल मध्ये त्यांचे फोटो आणि ध्वनीचित्रफीत पाठवून झालेली असते, आणि आम्ही आता त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियांची वाट पहात असतो. (अमेरिका आणि चीन सोडून) आता तो फुगा फुटला, किंवा फोडला, पाडला. तर आम्ही फुटलेल्या फुग्याचे फोटो पाठवले.

लग्न समारंभात वधू आणि वर यांनी एकमेकांना हार घातल्यानंतर (खरे तर त्यांनी हार पत्करल्यानंतर किंवा स्विकारल्यानंतर असे म्हणायचे होते.)  ते सगळ्यांच्या शुभेच्छा घेण्यासाठी मंचावर येण्या अगोदर त्यांचेच फोटो त्यांच्या मोबाईलवर आलेले असतात. (फक्त त्यावेळी त्यांना तेवढा वेळ नसल्याने ते बघत नाहीत. पण इतरांनी ते तत्परतेने पाठवलेले असतात.)

जन्मलेल्या बाळाचे आणि अखेरीस दिलेल्या गंगाजळाचे, वाढदिवसाच्या औक्षणाचे, काही गोड क्षणांचे, काढलेल्या जावळाचे, आणि पडलेल्या टक्कलाचे, आलेल्या दातांचे, आणि लावलेल्या कवळीचे, पदार्थांनी भरगच्च वाढलेल्या पानाचे, समुद्रातील स्नानाचे, झाडांचे, फुलांचे, खेळण्यात गुंग असलेल्या मुलांचे, अशा कोणत्याही प्रसंगाचे फोटो, चित्रण तत्परतेने पाठवायचे साधन.

पण यामुळे चांगले देखील बघायला, वाचायला, ऐकायला मिळते हे पण खरं आहे.

फक्त ते बघायची आणि इच्छा असल्यास पाठवायची तत्परता तुम्ही दाखवली पाहिजे…… बाकी उरलेलं तो तत्परतेने करतो.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – विविधा ☆ “स्मरण—सूर.. शब्दांचे…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “स्मरण—सूर.. शब्दांचे…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

“जन पळ भर म्हणतील हाय हाय” ह्या ओळी जरी सरसकट ख-या असल्या तरी काही व्यक्तींच्या बाबतीत ह्या लागू होत नाही हेच खरे. सहा  फेब्रुवारी! मागील वर्षी ह्याच तारखेला आपल्यातून लता मंगेशकर गेल्या.अर्थातच आपल्यासाठी त्या इतकी मोठी गाण्यांची ईस्टेट ठेऊन गेल्यात की रोज अजूनही त्यांची गाणी ऐकल्याशिवाय दिवस जात नाही आपला. त्यांना वर्षश्राद्धदिनी विनम्र अभिवादन.

ही  तारीख अजून एका जादुई शब्दांची किमयागाराची आठवण करुन देणारी तारीख. आज कवी प्रदीप ह्यांची जयंती त्यांना विनम्र अभिवादन.

लता म्हणजे एक अद्भुत आश्चर्य, लता म्हणजे साक्षात सरस्वती, लता म्हणजे एक जादू. आणि कवी प्रदीप हे सुप्रसिद्ध गीतकार. 

कवी प्रदीप ह्यांच मूळ नावं रामचंद्र नारायण द्विवेदी. कवी प्रदीप ह्यांच नाव घेतल्याबरोबर “ए मेरे वतन के लोगो” हे अजरामर गीत कानात गुंजायला लागतं. ह्या गाण्याला अतीशय सुंदर शब्दांत निर्मिलयं कवी प्रदीप ह्यांनी तर गोड गळ्याने  भावपूर्ण सुस्वर गाऊन सजवलयं लता मंगेशकर ह्यांनी. हे देशभक्तीपर गीत ऐकून आजही नशा चढते देशप्रेमाची,आठवतं शहीदांचे बलिदान. 1962 मध्ये झालेल्या चीन भारताच्या युद्धात भारताला पराभवाचा सामना करावा लागला.काही प्रदेश आणि त्याहूनही अनमोल असलेल्या सैनिकांचे प्राण गमवावे लागले.ह्मा गीताचे थेट प्रक्षेपण लता मंगेशकर ह्यांनी 27जून 1963 रोजी रामलीला मैदानावर केले. तेव्हा पंडीत नेहरुंच्या डोळ्यात शहीदांचे बलिदान आठवून अश्रु दाटले.ह्या गीताची रक्कम कवी प्रदीप ह्यांनी “युद्ध विधवा सहायता निधी” मध्ये वळती करायला लावली. कवी प्रदीप ह्मांनी तब्बल 1700 गीतं लिहीलीतं

त्यामध्ये “जय संतोषी माँ,चल चल रे नौजवाँ., आओ बच्चो तुम्हे सिखाए” ही गीतं खूप प्रसिद्धीस पावली.

लता मंगेशकर ह्यांच्या गाण्यांविषयी माहिती लिहायला गेलं तर पुस्तकही लहानच पडेल. लता मंगेशकर ह्या एक भारतीय गायिका आणि संगीतकार होत्या. भारतातील सर्वात महान आणि प्रभावशाली गायकांपैकी एक म्हणून त्यांना गौरविल्या जातं. भारतीय संगीत क्षेत्रामध्ये सात दशकांच्या कारकिर्दीतील योगदानासाठी त्यांना भारतीय गानकोकिळा  आणि क्वीन ऑफ मेलडी सारख्या सन्माननीय पदव्या मिळाल्या.

लता मंगेशकर ह्यांना दिदी म्हणूनही संबोधल्या जातं.लतादीदींनी तब्बल ३६ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी ध्वनिमुद्रित केली होती. त्या प्रामुख्याने हिंदी आणि मराठीत गात होत्या. आजच्या पोस्ट मध्ये त्यांना मिळालेल्या पुरस्कारांविषयी बघू.

त्यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. भारतरत्न, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे मानाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. १९८७ मध्ये त्यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला. २००७ मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना फ्रान्स चा  सर्वोच्च नागरी पुरस्कार, “द लीजन ऑफ ऑनर”ने सन्मानित केले. त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १५ बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन पुरस्कार, चार फिल्मफेअर  सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार, दोन  फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि बरेच इतर पुरस्कार मिळाले. १९७४ मध्ये, लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या.पुरस्काराचे वयाच्या ६१ व्या वर्षी सर्वात वयस्कर विजेत्या होण्याचा विक्रम मंगेशकर यांच्या नावावर आहे. त्यांना या श्रेणीतील अलीकडचा पुरस्कार लेकीन चित्रपटातील गाण्यांसाठी मिळाला आहे. ज्युरींनी त्यांना  हा पुरस्कार “दुर्मिळ आणि शुद्ध शैलींसह उत्कृष्ट अभिव्यक्तीसह गाण्यासाठी” प्रदान केला आहे.

त्यांनी अनेक उत्तमोत्तम गाणी गायलीत.तरी त्यातून काही गाण्यांना पुरस्कार मिळालेत ते खालीलप्रमाणे.

“परिचय “चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

“कोरा कागज “चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार,”लेकीन” चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, “चोरी चोरी” चित्रपटातील ‘रसिक बलमा’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.”मधुमती”मधील “आजा रे परदेसी”,”बीस साल बाद”मधील “कही दीप जले कही दिल”,”जीने की राह” मधील “आप मुझे अच्छे लगने लगे” हम आपके है कौन मधील “दीदी तेरा देवर दिवाना” साठी फिल्मफेअर विशेष पुरस्कार..!

खरंच लता मंगेशकर ह्या भारताची “शान” होत्या आणि कायम राहतील. दिदींच्या पुण्यतिथीनिमित्त आणि कवी प्रदीप ह्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुनश्च एकदा अभिवादन.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – विविधा ☆ “मरणा अगोदर जगून घ्या…” ☆ श्री वैभव चौगुले ☆

? विविधा ?

☆ “मरणा अगोदर जगून घ्या…” ☆ श्री वैभव चौगुले ☆

जीवन फार धावपळीचे झाले आहे. शिक्षण महाग झाले आहे.बाजारातील सर्वच आवश्यक असणा-या गोष्टी महाग झाल्या आहेत.मध्यमवर्गीय कुटुंब चालवणे खूपच कसरतीचे झाले आहे.आपण आपल्या जबाबदा-या पार पाडत असतोच, पण हे करत असताना समाधान मिळते का याकडे कुणाचे लक्ष आहे का?

तर मी म्हणतो,आपण कसे समाधानी राहू यावर लक्ष केंद्रित करा खूप दुर्घटना माणसांच्या आयुष्यात घडत असतात आणि आपल्याला या घटना पचवायची ताकद ईश्वर कोणत्या ना कोणत्या स्वरूपाने देत असतो.ती संधी वेळीच स्वीकारा सत्य जे समोर येतं त्याकडे पाठ फिरवू नका. मग  ते सत्य आनंद देईल किंवा दु:ख देईल.

मेहनत सर्वजण करतात.रतन टाटा असे म्हणतात आपण कोण आहे या पेक्षा आपण कसे आहोत हे महत्वाचे आहे.स्वभाव जुळत नाहीत.जबरदस्तीने काही कामे करावी लागतात. पण काही वेळा इलाज नसतो.पण लादलेली कामे कर्तव्य म्हणून केली तर त्रास होणार नाही.सर्वच गोष्टी माणसाच्या मनासारख्या होत नाहीत हे मान्य करून घ्यायला शिकलंच पाहिजे.

मी आपल्याशी बोलता बोलता कुठला विषय कुठे घेवून जात आहे हे माझ्याच लक्षात आले नाही. आजचाच एक प्रसंग, एक माणूस गाडीवरून जात असताना छान गाणं गुणगुणत होता. म्हणजे मला ऐकू आलं इतका त्याचा आवाज होता. साधारण सत्तावीस अठ्ठावीस वर्षांचा तो तरूण असावा.सांगण्याचा हेतू दिवसभर काम करून थकून घरी जात असताना तो इतका खूष असेल तर तो किती समाधानी आहे हे त्याच्या गाणे गुणगुनणण्यावरून लक्षात आले. पैसा खूप जवळ असला म्हणजे आपण खूप समाधानी आहोत आणि राहू ,हा मनाचा गोड गैरसमज  आहे.

लोक आपण न केलेल्या गोष्टीकडे फोकस करत बसतात. एखाद्या व्यक्तीने आपल्यासाठी काय केले ते ही कोणत्या परिस्थितीमध्ये हे लक्षात घेत नाहीत.उलट त्यांनी काय केलं नाही यावर बोलत राहून मिळालेला आनंद त्यांना उपभोगता येत नाही. तर न केलेल्या गोष्टी उगाळत बसल्यामुळे येणा-या आनंदावर पाणी फिरून जात असतं हे त्यांच्या लक्षात येत नाही.

कुणामुळे कुठलेच कोणाचे काम थांबत नाही हे तर मान्य आहे.आपण एखादे काम केले नाही म्हणून ते काम काही काळ थांबेल पण कायमस्वरूपी ते काम थांबत नाही. कुणीच ते काम करणार नाही असं होत नाही…ते काम कोणाकडून तरी होणार हे नक्की!

सांगण्याचा उद्देश असा की जीवन जगत असताना समाधानी राहायला शिकलं पाहिजे.स्वप्नं बघताना जी स्वप्ने पूरी करता येतील अशीच स्वप्ने पहावी.आणि ती स्वप्ने पूरी करून त्याचा आनंद घ्यावा.रोजची धावपळ करत असताना आपल्यासाठी काही वेळ घालवावा मग त्यामध्ये आपला छंद जो आहे त्यावर लक्ष केंद्रित करावे.मग तो छंद लिखाणाचा असेल, वाचनाचा असेल ,मुव्ही पाहण्याचा असेल, निसर्गाच्या सानिध्यात फिरण्याचा असेल, मित्राशी गप्पी मारण्याचा असेल आपल्याला ज्यात मन रमेल तो छंद आपण मनापासून जोपासावा आणि का जोपासू नये?

गेलेली वेळ परत येत नाही वय वाढत जाते,अनुभव येत राहतात मागे वळून पाहिले तर आपण घेतलेले निर्णय चुकीचे वाटू लागतात.पण असे न होता एखादा निर्णय आयुष्य बदलून जातो.असं काहीसं घडत असतं!

समोरच्या माणसाने काय करावे, कसे वागावे, हे आपण नाही ठरवू शकत पण आपण मात्र योग्य दिशेने योग्य विचाराने वागण्यास काय हरकत आहे…

समोरचा माणूस चुकीचं वागत असेल तर आपला नाईलाज असतो आणि त्याच्या बदलण्याने त्रास होत असेल तर तो त्रास आपण का करून घ्यावा.जर त्याला तो त्रास होत नाही तर आपणतरी तो त्रास का करून घ्यायचा. काही वेळा समोरचा कसा वागतो त्याच्याशी तसेच वागावे लागते.

आपल्यातल्या मीपणालाही केव्हातरी संधी द्यावीच लागते. समोरचा माणूस मनासारखा वागत नाही म्हणून दु:खाला कवटाळून का बसावे.भांडण एकाशी त्याचा परिणाम आपण इतर गोष्टींवर करत असतो, हे का कळत नाही ? आपलं एकाशी भांडण होतं. पण इतर नात्यातून जो आनंद  मिळणार असतो तो का आपण घेत नाही. जीवन आपल्याला पुन्हा मिळणार आहे का हो, नाही ना ? आणि वय उलटी गिनती करणार आहे का नाही ना? लहानपण, तरूणपण व म्हातारपण चुकलं आहे का, नाही ना?

जगात एकच गोष्ट अटळ आहे

मरण….येणारच फक्त कधी येईल आणि कोणत्या रूपाने येईल माहीत नसतं, फक्त त्याला कारण हवे असते…म्हणून मरणा अगोदर जगून घ्या…जगून घ्या……….

© श्री वैभव चौगुले

सांगली

मो 9923102664

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – विविधा ☆ “अर्थसंकल्पाच्या निमित्ताने” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “अर्थसंकल्पाच्या निमित्ताने…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

नुकताच अर्थसंकल्प जाहीर झाला. सगळ्या देशाचं म्हणजेच अर्थतज्ञ मंडळींच ,व्यापा-यांच तसेच आर्थिक बाबीशी निगडित असलेल्या प्रत्येकाचं लक्ष ह्याकडे होतचं. प्रत्येक अर्थसंकल्प हा थोडी खुशी थोडा गम स्टाईलच असतो. ह्यामुळे ह्यात कोणाला जरा दिलासा मिळतो तर कुणाला पुढील सगळ्या गोष्टींची तरतूद करून ठेवावी लागते.

लहानपणापासून प्रश्न पडायचा हे अर्थशास्त्र, अंदाजपत्रक म्हणजेच बजेट आणि अर्थसंकल्प ही काय गोष्ट आहे? तेव्हा ह्या बाबींशी फारसा संबंध न आल्याने ह्याचे चटकन आकलन व्हायचे नाही..

मग थोडसं ह्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं अर्थसंकल्पामध्ये आयव्ययाचे म्हणजेच जमाखर्चाचे अंदाजपत्रक करआकारणी, वस्तुंच्या किमती ह्या सगळ्याची सविस्तर मांडणी म्हणजेच एक प्रकारचं गणित असतं.थोडक्यात अर्थसंकल्पाची व्याख्या म्हणजे विशिष्ट आर्थिक परिस्थितीने लादलेल्या आर्थिक मर्यादांनुसार जमाखर्चाची ताळमेळ बसवतं तोंडमिळवणी करण्याची कला म्हणजे अर्थसंकल्प. प्रत्येक व्यक्तीला आणि संघटनेला अर्थसंकल्प ,बजेट ह्या गोष्टी आखाव्याच  लागतात. त्यानुसार आपले खर्चाचे आणि उत्पादनाचे कार्यक्रम योजावे लागतात.

लहानपणी आईबाबांची,वडीलधाऱ्या मंडळींची बजेट,बचत,तरतूद ह्या बाबींना व्यवस्थित महत्त्व देणं बघतं आलेय.आणि आज जरा युवावर्गाचे आजचा दिवस मस्त जगून घ्यावा, उपभोगून घ्यावा हा फंडा पण बघतेयं. ह्या दोन्ही बाबी अगदी तशा विरोधी त्यामुळे कायम मनात द्वंद्व  उभं राहायचं नक्की कोणाचं बरोबर आधीच्या पिढीचं की नंतरच्या पिढीचं.

पण दोन वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या आकस्मित संकटाने ह्या प्रश्नाचं उत्तरं जवळपास शोधून दिलं.तसं तर कोणतीच टोकाची भुमिका ही बरोबर नसते पण योग्य म्हणून निवडायची झाली तर मला जास्त मागील पिढीची

भूमिका म्हणजेच भूक नसली तरी शिदोरी ही हवीच ही जास्त पटली. लहानपणी आईबाबांची बजेट,नियोजन, पुढील तरतूद ह्या गोष्टी म्हणजे कंजुषपणा वाटायचा. पण आता वाढत्या प्रचंड महागाईने,आर्थिक डोलारा डळमळीत झाल्याने,रोजगार मिळण्याच्या भ्रांत पडण्याच्या परिस्थिती ने परत एकदा आईबाबाचं बरोबर हे मी मनोमन कबूल केलयं.

पुढे बँकींग सेक्टर मध्ये काम करतांना “अंथरुण पाहून पाय पसरावे”, ह्या म्हणीचा प्रत्यय बघण्याचा योग खूपदा आला.बरेच जण आर्थिक नियोजन नीट न करता वारेमाप कर्जामुळे मानसिकरित्या कोलमडलेले पण बघण्यात आले.त्यामुळे मला मुळात आधीच भविष्याचे नीट नियोजन, आखीवरेखीव संकल्पना, आपलं बजेट हे आधीचं आखून कच्चा आराखडा तरी तयार असणं हे आवडायचं पण ह्या बँकींग सेक्टर मध्ये आल्याने त्याची आवश्यकता ही नक्कीच लक्षात आली.व्यापक दृष्टिकोनातून खूप काही शिकायला मिळालं,अनुभव गाठीशी बांधता आले.त्यामुळे दरवर्षी बजेट आखतांना हे मनाशी मी आधीच ठरवायचे आरोग्य,शिक्षण आणि घरचे ताजे सात्विक खाणे ह्यात अजिबात नो काटकसर परंतू चैनीच्या गोष्टी, ज्याचा कधीच अंत नसतो अशा रोज बाजारात नित्यनवीन येणाऱ्या गोष्टी, ज्या गोष्टी कमीपैशात वा स्वस्तात मिळाल्यातरी स्टेटस च्या नावाखाली डोलारा आखणं ह्याला अजिबात मनातच थारा द्यायचाच नाही.

खरचं प्रत्यक्ष संसारातील, घराचं बजेट तयार करतांना यजमान वा गृहीणीची तारांबळ उडते तर प्रत्यक्ष एवढ्या मोठ्या देशाचं आर्थिक नियोजन ही काही साधीसोप्पी गोष्ट नव्हे.तरी दरवर्षी केंद्रीय अर्थमंत्र्यांना ही कसरत करावीच लागते आणि सामान्य जनता त्यातील लाभ हानी जाणून घ्यायला उत्सुक असते.असा हा पैशांचा खेळ व्यवस्थित मेळ घालून खेळावाच लागतो.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈