मराठी साहित्य – विविधा ☆ “सामाजिक संस्थेविषयी” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “सामाजिक संस्थेविषयी☆ श्री जगदीश काबरे ☆

लोकांपासून कसलेही काम घ्यावयाचे असेल, तर सोशिकपणा धारण केला पाहिजे, हा आपल्या विचाराचा गाभा असला पाहिजे तरच आपण समाजसुधारणेच्या कामाला तग धरू शकू. सुधारणेची गरज असते सुधारकाला, स्वतःला ज्या लोकांपासून तो सुधारण्याची अपेक्षा करतो, त्यांच्याकडून त्याने विरोधाची, तिरस्काराची, किंबहुना जीवावरील संकटाचीही अपेक्षा ठेवली पाहिजे. कारण सुधारक जिला सुधारणा म्हणतो, ती कुधारणाच आहे, असे स्थितिशील समाजाला वाटत असते

अनेक सार्वजनिक संस्था सुरू करून, त्यांची व्यवस्था चालविण्याच्या जबाबदारीचा अनुभव घेतल्यानंतरच मी अशा दृढ निर्णयावर आलो की, कोणत्याही जाहीर संस्थेने कायम फंडावर गुजारा करण्याचा प्रयत्न करू नये. तसे करण्यामध्ये तिच्या नैतिक अधोगतीचे बीज साठविलेले आहे. सार्वजनिक संस्था म्हणजे लोकांची मान्यता आणि लोकांचे पैसे यांवर चालणारी संस्था. अशा संस्थेला लोकांची मदत मिळेनाशी होईल, तेव्हा तिला अस्तित्वात राहण्याचा हक्कच राहत नाही. कायम फंडावर चालणाऱ्या संस्था लोकमताविषयी बेपर्वा होताना आढळतात; कित्येक वेळा तर धडधडीत लोकमतांविरुद्ध आचरण करताना दृष्टीस पडतात. अशा तऱ्हेचे अनुभव आपल्याला पावलोपावली येतात.

धार्मिक म्हटल्या जाणाऱ्या कित्येक संस्थांच्या हिशेबठिशेबांचा ठावठिकाणा नाही. त्यांचे संस्थापक, त्यांचे मालक होऊन बसले आहेत आणि त्यांच्यावर कोणाचा ताबा चालत नाही. सृष्टी ज्याप्रमाणे रोजचे अन्न रोज तयार करून रोज खाते, त्याप्रमाणे सार्वजनिक संस्थांचे असले पाहिजे, याबद्दल मात्र मला तिळमात्र शंका नाही. ज्या संस्थेला लोक मदत करण्यास तयार नाहीत, त्या संस्थेला सार्वजनिक संस्था म्हणून जगण्याचा अधिकारच नाही. प्रतिवर्षी मिळणारा फंड, ही त्या त्या संस्थेच्या लोकप्रियतेची व तिच्या चालकांच्या प्रामाणिकपणाची कसोटी आहे आणि प्रत्येक संस्थेने या कसोटीला उतरलेच पाहिजे, तरच ती संस्था लोकांच्या विश्वासास पात्र ठरेल. 

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ६० ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ६० ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- मी अहमदनगरहून निघताना ” नव्या जागी जाल तेव्हा आधी शेगावला जाऊन महाराजांचं दर्शन घ्या आणि मगच रूजू व्हा. सगळं छान होईल ” असं काकू म्हणाल्या होत्या. मीही तेच ठरवलं होतं. म्हणूनच काकूंच्या तोंडून गजानन महाराज ‘तथास्तु’ म्हणालेत असंच मला वाटलं होतं!)

‘सगळं छान होईल’ म्हणजे नेमकं काय याचा प्रत्यय एखादा चमत्कार घडावा तसा अकोला येथील माझ्या अल्प वास्तव्यात मला येणार आहे याची मात्र मला कल्पना नव्हती.

अकोला ब्रॅंचचे माझ्याशी ऋणानुबंध होते जेमतेम सहा महिन्यांचेच. पण माझ्यासाठी हा तोवरच्या प्रदीर्घ बँकिंग करिअरमधला अक्षरशः तारेवरची कसरत वाटावा असाच काळ होता. त्यातला प्रत्येक दिवस माझी कसोटी पहाणारा, अकोल्यातल्या भाजून काढणाऱ्या कडक उन्हासारखे असह्य चटके देणारा, रेंगाळत, माझी गंमत बघत हळूहळू पुढे सरकणारा असाच होता!

मी अहमदनगरहून रिलीव्ह झाल्यानंतर रातोरात अकोल्यासाठी प्रवास सुरू केला होता तो फक्त रोजच्या लागणाऱ्या सामानाची एक मोठी सुटकेस बरोबर घेऊन. बदली झाल्यानंतरच्या नव्या गावी पहिले आठ दिवस आमची सर्व व्यवस्था लाॅजमधे बँकेमार्फतच होत असल्याने तिथे गेल्यानंतर रहाणं, जेवणखाण, चहापाणी हा तातडीचा प्रश्न नव्हता हे खरं, पण पहिल्याच दिवशी ब्रॅंचमधे गेल्यानंतर समजलं कीं तिथे ब्रॅंच मॅनेजर्ससाठी क्वार्टर्सची सुविधा उपलब्ध नाहीय. सुदैवाने ऑडिट डिपार्टमेंटमधे माझ्याबरोबर कांही काळ काम केलेले श्री. देशपांडे पहिल्याच दिवशी मी ब्रॅंचमधून बाहेर पडताना तिथे आले. ते मूळचे अकोल्याचेच आणि मी आजच तिथे रूजू झालोय हे समजल्यामुळे ते मुद्दाम मला भेटायला आलेले होते. त्यांचा अकोल्यातील स्वत:चा फ्लॅट रिकामाच होता. एरवी त्यांनी तो पुढे व्याप नकोत म्हणून कुणालाच भाड्याने दिलेला नव्हता.

” सर, तुम्ही जागेची काळजी करू नका. तुम्ही इथे असेपर्यंत हा फ्लॅट तुमचा. ” ते म्हणाले आणि जागेचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच सुटला. त्या परिस्थितीत मला हा एक शुभशकूनच वाटला होता.

तेव्हाच्या मन:स्थितीत पहिल्याच दिवशी घडलेली ही घटना पुढे येणाऱ्या प्रत्येक पावलावरील प्रतिकूल परिस्थितीला हिंमतीने तोंड देण्यासाठी उमेद देणारी ठरली एवढे खरे. दुसरी एक महत्त्वाची जमेची बाजू म्हणजे ब्रॅंचमधला स्टाफ! त्या सर्वांच्या आपुलकीच्या सहकार्यामुळेच मी थोडाफार का होईना बऱ्यापैकी स्थिरस्थावर होण्याची आशा बाळगून होतो.

इतक्या तातडीने माझी अकोल्याला बदली होण्यामागचे कारण सर्वस्वी नकारात्मक होते. आणि तेच माझ्यापुढचं मोठं आव्हान ठरणार होतं. प्रतिकूल हवामान, घरापासूनचं अतिशय दूर आणि तुलनेने बरचसं रूक्ष असं इथलं वातावरण अधिकच असह्य वाटावं इतकी नकारात्मकता माझ्या या बदलीमागच्या कारणामधे ठासून भरलेली होती. ते कारण तसं पाहिलं तर जगावेगळं नव्हतं. अशा घटना तुरळकपणे कां होईना प्रत्येक बँकेत घडत असतातच असंही म्हणता येईल. पण माझ्या दृष्टीने ते समर्थनीय ठरणारं नव्हतं. तो माझ्यासाठी पूर्वी कधीच न अनुभवलेला असा एक कटू अनुभव होता! शेवटी भलीबुरी माणसं सगळीकडे असणारंच. पण माझा हा अनुभव म्हणजे अशा माणसांमुळे एरवी सुरळीत सुरू असणाऱ्या व्यवस्थेवर केवढा प्रचंड ताण येऊ शकतो याचं प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल. माझी इथं तात्काळ बदली होण्यामागचं कारणही तसंच गंभीर आणि अचानकच निर्माण झालेलं होतं. अॅडव्हर्स ऑडिट रिपोर्टमुळे अकोला ब्रँचमधील मॅनेजरची लगोलग गच्छंती झालेली होती आणि तिथले पुढचे व्याप निस्तरण्यासाठी माझं तिथं हे पोस्टींग! माझी कसोटी पहाणारं आव्हान होतं ते. त्या कसोटीला उतरणं म्हणजे नेमकं काय काय होतं हे इतक्या वर्षानंतर आज आठवतानाही माझ्या अंगावर सरसरून काटा उभा रहातो!

बँकेच्या कर्ज योजनांमधील मंजूरी आणि वितरणामधे आधीच्या मॅनेजरने दाखवलेली अनावश्यक तत्परता, राहून गेलेल्या त्रुटी आणि त्यामुळे होऊ शकणारे बँकेचे आर्थिक नुकसान हे अॅडव्हर्स ऑडिट रिपोर्टमधले मुख्य आक्षेप. युद्धपातळीवर दखल घ्यायला हवी अशी ती अकरा कर्जखाती होती ज्यामुळे बँकेचे लाखो रुपयांचे नुकसान व्हायची शक्यता होती. होऊ शकणाऱ्या या आर्थिक नुकसानीची जबाबदारी कुणाची हे ठरवण्याचं काम वरिष्ठ पातळीवर आधीच सुरू झालेलं होते. कर्ज वसुलीसाठी कायदेशीर कारवाईसह सर्व प्रयत्न तातडीने सुरू करणे ही नवीन मॅनेजर म्हणून माझी जबाबदारी होती. पण हे काम सहजसोपे नव्हते. ब्रॅंच मॅनेजर म्हणून असणाऱ्या इतर जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष न करता हे करणे ही तारेवरची कसरत लगेचच सुरू झाली. रोजचं ब्रॅंचरूटीन आणि दैनंदिन कामांच्या जबाबदाऱ्या सांभाळताना या कर्जखात्यांची माझ्या डोक्यावरची टांगती तलवार मला क्षणाचीही उसंत मिळू देत नसे.

त्या सर्व कर्ज फाईल्स बारकाईने अभ्यासण्यासाठी सुरुवातीच्या तीन-चार रात्री मी अक्षरशः जागून काढलेल्या होत्या. सर्व कर्जदारांना दिलेल्या नोटिसा त्यांनी न स्वीकारल्याने परत आलेल्या होत्या, त्यांचे व्यवसाय अस्तित्वात नव्हते, किंबहुना कर्ज वितरणानंतर अल्पकाळातच निर्माण झालेली ही परिस्थिती कर्जरकमेचा जाणीवपूर्वक केलेला दुरूपयोग अधोरेखित करणारीच होती. अशा परिस्थितीत बँकेचे आर्थिक नुकसान टाळण्याचा एकमेव उपाय म्हणजे अशा सर्व खातेदारांविरुद्ध क्रिमिनल केसेस दाखल करणे हाच होता. आणि वरिष्ठ कार्यालयाने तोच अंमलात आणायचे ठरवले होते. पण माझ्यासाठी ते प्रोसेस योग्यपध्दतीने पूर्ण करणे वाटते तेवढे सोपे नाहीये हे सुरूवातीपासूनच मला पदोपदी जाणवत राहिले. नागपूर आणि पुणे येथील दोन्ही वरिष्ठ कार्यालयांनी युद्ध पातळीवर याचा पाठपुरावा सुरू करून अक्षरशः माझी झोप उडवली होती!

सर्व पातळ्यांवर सुरू असलेले माझे अथक प्रयत्न म्हणजे खरंतर न जिंकता येणारी लढाई लढण्यासारखं होतं, पण मी ती अखेरच्या क्षणापर्यंत लढायची हे मनोमन ठरवून टाकलं. कागदी घोडे नाचवत स्वत:ची कातडी बजावण्यात समाधान मानणं मलाच पटणारं नव्हतं. ही बॅंक आपली अन्नदात्री आहे आणि तिचं नुकसान हे माझंही नुकसान असणार आहे हीच भावना मनात असल्याने क्षणाचीही उसंत न घेणे हाच माझा मनोमन केलेला ठाम निर्धार होता! तोपर्यंत तिथे अशी घटना पूर्वी कधी घडलेली नसल्याने अॅप्रूव्ह्ड अॅडव्होकेट पॅनलवर एकही क्रिमिनल लॉयर नव्हता. आमच्या इतर कोर्ट केसेसच्या संदर्भात माझ्याकडे येणाऱ्या बॅंकेच्या वकिलांशी चर्चा केल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार अकोल्यामधे अनुभवी असे दोनच क्रिमिनल लाॅयर्स होते. त्यातही जे सीनियर आणि नावाजलेले होते त्यांचंच नाव बँकेच्या वकिलांनी आवर्जून सुचवलेलं होतं. त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटणं, सगळा प्रॉब्लेम समजावून सांगणं, आणि त्यांचा बायोडेटा घेऊन वरिष्ठ कार्यालयाकडून त्यांच्या नावाला मान्यता मिळवणं या वेळखाऊ औपचारिकता पूर्ण होण्यापूर्वीच पुढचं सगळं किचकट प्रोसेस आधीच सुरू करण्याची मी वकिलांना केलेली विनंती परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी लगेच मान्य केली हा त्या मन:स्थितीत मला फार मोठा दिलासा वाटला होता!

मी चार्ज घेतल्यानंतरच्या पहिल्या पंधरा दिवसातल्या या उलाढाली! या पंधरा दिवसात या सगळ्या घटनांमागच्या, माझ्या लाडक्या ताईच्या चटका लावून गेलेल्या दु:खद मृत्यूपासून मी अकोल्याला बदली होऊन इथे येईपर्यंतच्या काळातल्या सगळ्याच घटनांचा या कामाच्या व्यापात मला नकळत विसरच पडला होता. त्यादिवशी रात्री अंथरुणाला पाठ टेकली आणि ते सगळेच प्रसंग मला नव्याने आठवले. मनातला दृष्टीआडचा ‘तो’ प्रसन्न नजरेने माझ्याकडेच पहात होता. ती नजर दिलासा देणारी, मनाला अनामिक अशी स्वस्थता देणारी होती. मी समाधानाने डोळे मिटले. त्या मिटल्या डोळ्यांना मात्र उद्यापासूनचा प्रत्येक क्षण खऱ्या अर्थाने माझ्या सहनशक्तीची कसोटी पहाणारा ठरणाराय याची कल्पनाच नव्हती…!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावरकर आणि मी : लेखांक ३ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? विविधा ?

सावरकर आणि मी : लेखांक ३ ☆ श्री सुनील देशपांडे 

(सावरकरांच्या बाबत यापूर्वी मी दोन लेख लिहिले आहेत. त्याच मालिकेतील हा तिसरा लेख.)

‘सावरकर समजून घेताना’

खरं म्हणजे सावरकरांचे चरित्र म्हणजे ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक(?). त्यातील अंदमानातील तुरुंगवास संपेपर्यंतच(?). कारण अनेकांनी तेवढंच वाचलंय. सावरकरांच्या चरित्राला अंदमानातल्या सुटकेचे कुंपण घालून तेवढ्यावरच त्यांचा उदो उदो करणाऱेच जास्त.   त्यानंतर त्यांनी हिंदू समाजातील अनेक दुष्प्रथांवर प्रचंड कोरडे ओढणाऱ्या समाजकार्याबद्दल किती जणांनी सविस्तर जाणून घेतलंय?   सावरकर ब्रिटिशांच्या स्थानबद्धतेमुळे आणि त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळामधील उपेक्षित जीवनामुळे  काहीच करू शकले नाहीत (?) अशा प्रकारचा एक मतप्रवाह असणारेच अनेक.  सावरकरांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि त्यांची प्रभावी विचारसरणी ही समजून घेताना, आपले वाचन अथवा ज्ञान ‘माझी जन्मठेप’ या पुस्तकापुरते (आणि आता सावरकर सिनेमा पुरते) मर्यादित असता कामा नये असे माझे मत आहे.  सावरकरांना टोकाचे हिंदुत्ववादी बनवून त्यांचा हिंदुत्ववाद समजूनही न घेता त्यांना ईश्वरवादी समजणाऱ्या माणसांची संख्याच जास्त आहे असे मला वाटते.

परमेश्वराच्या अस्तित्वाला नाकारा. भजन पूजन करू नका. देवळे बांधू नका. धार्मिक विधी करू नका. धार्मिक परंपरा धरू नका, रूढी या माणसाला नष्टचर्याकडे नेणाऱ्या आहेत. कोणतीही प्रथा काल सुसंगत आणि कालमान परिस्थितीनुसार  बदलता आली पाहिजे. श्रुती आणि स्मृती संपूर्णपणे नाकारणारा आणि त्यांच्या विरोधात प्रचंड लेखन करणारा.  जातीयवाद आणि अस्पृश्यता यांच्याबाबत समाजाशी प्रचंड संघर्ष करणारा. दारू अथवा मांसाहार या गोष्टी चुकीच्या आहेत असे न मानणारा, अर्थात व्यसनाधीन होऊ नका हेही सांगणारा. असा एक जबरदस्त आधुनिक विचारांचा नास्तिक माणूस. याला परंपरावादी लोक हिंदू म्हणून तरी स्वीकारणार आहेत काय हाच मुळातला प्रश्न आहे. हिंदुत्ववादी आणि हिंदूहृदयसम्राट अशी बिरुदावली ज्यांना अर्पण केली आहे त्या सावरकरांना सर्व बाजूंनी समजून घ्यायचे असेल तर, त्यांच्या या विचारांना सुद्धा हिंदुत्वाचे विचार म्हणून स्वीकारले पाहिजे. हे स्वीकारणार आहात काय ? खरे तर त्यांना राष्ट्रनिष्ठसम्राट असे म्हणणे हेच जास्त संयुक्तिक आहे असे वाटते. स्थानबद्धतेत असताना सावरकरांनी  प्रचंड मोठे समाजकार्य केले आहे. 

पु ल देशपांडे यांनी एक छान वाक्य त्यांच्याबद्दलच्या व्याख्यानात सांगितलं आहे की ‘सावरकरांनी माझ्यावर फार मोठे उपकार केले ते हे की, त्यांनी मला नास्तिक बनवलं’  ह्या विचारांशी किती जण सहमत होतील मला शंका आहे.

त्यांचा मुळात राग किंवा वाद हा वर्षानुवर्षे अन्याय व अत्याचार करणारे आणि वर्षानुवर्षे अन्याय व अत्याचार सहन करणारे यांच्यातला वाद होता. मुस्लिमांच्या विरोधात त्यांनी फक्त एखादी व्यक्ती मुस्लिम आहे म्हणून त्यांचा द्वेष करावा असे सांगितलेच नाही. ज्यांच्या निष्ठा इथल्या भूमीशी प्रामाणिक आहेत ते मुस्लिम असले तरी, त्यांना मी हिंदूच म्हणेन असे ते म्हणत. त्यांचा मुळात आक्षेप मुस्लिम समाजाच्या निष्ठा जर आपल्या देशाबाहेरील कुठल्यातरी दुसऱ्या देशात वा देशाशी जोडल्या गेल्या असतील तर ते राष्ट्रनिष्ठ होऊ शकत नाहीत. अशा राष्ट्रविरोधी विचारांच्या व्यक्तींना विरोध करा. वर्षानुवर्षे ज्यांनी एतद्देशियांवर अन्याय आणि अत्याचार केले त्यांचे समर्थन करणार असाल तर तुम्ही राष्ट्रनिष्ठ नाही.  मग तुम्ही हिंदू असला आणि अस्पृश्यांवर अत्याचार केले असतील आणि त्याचे समर्थक असाल तरीही तुम्ही हिंदू म्हणून घेण्याच्या लायकीचे नाही. एवढे त्यांचे हिंदुत्व वेगळ्या टोकाचे होते.  हे किती जणांना पटणार किंवा पचणार आहे हाच मुळातला प्रश्न आहे.  या देशात ब्रिटिशांचे राज्य नसते तर ते कांही हिंदूंच्या विरोधात सुद्धा लढले असते. सावरकरांच्या मते राष्ट्रवाद हाच हिंदुत्ववाद. परंतु त्यांच्याच काही समर्थकांनी हे वाक्य उलटे करून हिंदुत्ववाद हाच राष्ट्रवाद असे बनवले.

अल्लाउद्दीन खिलजी जेव्हा हिंदूंच्या महिलांवर अत्याचार करत होता हिंदूंची देवळे नष्ट करीत होता त्या जागी मशिदी बांधीत होता हजारो हिंदूंना बाटवून धर्मांतरित करीत होता त्यावेळी तुमचा विठोबा ज्ञानेश्वरांची भिंत चालवत होता? हे वाक्य किती जणांना पचणार आहे?

एके दिवशी सेनान्हाव्याला बादशहाकडे जायला उशीर झाला. तेव्हा विठोबाने सेना न्हाव्याचे रूप घेऊन बादशहाची दाढी केली या घटनेचा उपहास करताना ते म्हणतात ‘ विठोबाने त्याच वेळेला, हिंदूंवर अन्याय आणि अत्याचार करणाऱ्या बादशहाची मान का छाटून टाकली नाही? गुलामांचा देवही गुलामच.’

अशा तऱ्हेने कपोल कल्पित संतांच्या कथांवर त्यांनी प्रखर विचारांचे आसूड ओढले. या कथांमधून किंवा या विचारांमधून लोकांची अन्याया विरोधी लढण्याची अस्मिताच नष्ट करून टाकली.  गुलामगिरी पुढे समाज नतमस्तक होऊ लागला. समाज नेभळट बनला. स्वातंत्र्याची उर्मी समाजात निर्माण करण्यासाठी त्यानंतर खूप त्रास झाला. असे त्यांचे स्पष्ट मत होते.

‘मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव’ ‘दोन शब्दात दोन संस्कृती’ हे निबंध किंवा  एकूणच सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंधाचे दोनही भाग तसेच ‘क्ष किरणे’ वगैरे पुस्तके. हे वाचण्याची तसदी किती जणांनी घेतली असेल? ‘क्ष किरणे’ मध्ये श्रुती आणि स्मृतिंवर त्यांनी केलेली भाष्ये

ही मुळातच आपल्या मनातील धार्मिक परंपरांना उलटेपालटे करणारी आहेत.  ‘गाय केवळ उपयुक्त पशू माता नव्हे,  देवता तर नव्हेच नव्हे’ हे त्यांच्या एका निबंधाचे शीर्षक आहे हे किती जण जाणतात आणि ते पटवून घेऊ शकतात?

परंपरावादी तथाकथित हिंदुत्ववादी  व्यक्तींना न पटणारी, न पचणारी, न आवडणारी किंवा कानावरही पडायला नको वाटणारी अशी वाक्ये ठासून भरलेले सावरकरांचे वाङ्मय वाचताना अशा तथाकथित हिंदुत्ववाद्यांचे काय होईल?

स्वतःच्या सामाजिक विचारांशी सुसंगत अशा व्यक्ती त्यांना मोठ्या प्रमाणात जमवता न आल्यामुळे त्यांनीच स्थापन केलेल्या हिंदूमहासभेला त्यांना सोडचिठ्ठी द्यावी लागली असावी असे आज मला वाटते. स्वातंत्र्योत्तर काळातही त्यांना उपेक्षित जीवन जगावे लागले. कारण त्यांची काँग्रेसने केलेली उपेक्षा हे खरे असले तरी, त्या बरोबरच त्यांच्या हिंदुत्ववादी विचारांशी पटवून न घेता आल्यामुळे तथाकथित हिंदूंनी सुद्धा त्यांची केलेली उपेक्षाही जास्त कारणीभूत आहे. सावरकरांना हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या लोकांनी सावरकरांचे हे विचार तसेच, ते विचार ज्यामध्ये आहेत ते वाङ्मय समाजात पसरूच दिले नाही. त्यांची खरी ओळख समाजाला होणे हे टाळण्यात हिंदुत्ववादी परंतु मनातून सावरकर विरोधी विचारांच्या तथाकथित विचारवंतांनी सावरकरांचे हे विचार समाजामध्ये मोठ्या प्रमाणात पसरवण्याचे टाळले.

त्याचप्रमाणे भाषाप्रेमी, साहित्यनिष्ठ आणि काव्यानंदात वेदना विसरणारे. आपली प्रखर विचारसरणी साहित्यिक आणि कलात्मक स्वरूपात समाजासमोर मांडू शकणारे. मराठीभाषाहृदयसम्राट सावरकर समजून घेणे हा सुद्धा खूप मोठा वैचारिक व्यायाम आहे.

सावरकरांमधील या साहित्यिक पैलूं बाबत सुद्धा फार कमी लिहिलं आणि बोललं गेलेलं आहे अर्थात त्याबाबत पुन्हा कधीतरी. झाला एवढा वैचारिक व्यायाम वाचकांना खूप झाला असे वाटते.

© श्री सुनील देशपांडे

पुणे, मो – 9657709640 ईमेल  : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावरकर आणि मी : लेखांक २ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? विविधा ?

सावरकर आणि मी : लेखांक २ ☆ श्री सुनील देशपांडे 

सावरकरांच्या विचारांचा प्रभाव आणि पराभव (?)

केशवसुतांनी त्यांच्या तुतारी या कवितेतून “जुने जाऊ द्या मरणालागुनी, जुन्यातून हो निष्पत्ती नवी” जुन्या परंपरा मोडीत काढा आणि त्या जुन्या परंपरेतलं तत्व लक्षात घेऊन नव्या परंपरा निर्माण करा असा संदेश दिला होता. तत्त्व महत्त्वाचं की परंपरा? समाजजीवन महत्त्वाचं की परंपरा? : माणूस महत्त्वाचा की परंपरा? या सगळ्या परंपरा मानवासाठी आणि पर्यायाने समाज जीवनासाठी योग्य अशा असल्या पाहिजेत. अनेक परंपरा कालमान परिस्थितीनुरूप बदलल्या पाहिजेत हा संदेश सतत समाजसुधारक देत आले आहेत. अगदी कालच (हा लेख सावरकरांच्या पुण्यतिथीच्या दुसऱ्या दिवशी लिहिलेला आहे) सावरकरांचा उदो उदो खूप झाला. सावरकरांनी तर समाजसुधारणांचे कितीतरी पैलू समाजासमोर ठेवले होते. परंतु सावरकरांची मार्सेलिस बंदरातील उडी आणि अंदमानातील हाल-अपेष्टा यापुढे सावरकरांच्या जीवनाचा आणि कार्याचा कुणी विचारच करत नाही. उलट अंदमानातून पुढे सुटून आल्यानंतर, रत्नागिरी मधील त्यांच्या वास्तव्यामध्ये त्यांनी जे कार्य केलं ते त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं कार्य. पण ते कुणाला पटणार नाही वा पचणारही नाही. हिंदू समाजाला तर ते कधीच झेपणार नाही. सावरकरांनीच निर्माण केलेली हिंदुमहासभा, पण त्या हिंदूमहासभेच्या अनुयायांना सुद्धा सावरकर झेपले नाहीत. त्यांचेही कार्य हे सावरकरांच्या तत्वज्ञानाच्या विरोधातच चालू झालं हे सावरकरांचे दुर्दैव आहे. परंतु असं दुर्दैव अनेक समाजसुधारकांच्या वाट्याला येतं. त्यांच्या तत्त्वज्ञानाऐवजी त्यांची मूर्ती गाभार्‍यात ठेवून त्यांच्या नावाचे टाळ कुटत राहणे, यातच धन्यता मानणारा समाज हे या सर्व समाजसुधारकांचे दुर्दैव आहे. हे दुर्दैव महात्मा गांधी यांच्या वाट्याला सुद्धा आलं. त्यांनाही ते चुकलं नाही.

दोन शब्दात दोन संस्कृती या सावरकरांच्या निबंधात त्यांनी ‘श्रृती-स्मृती पुराणोक्त’ आणि ‘अपटूडेट’ या दोन शब्दांचा दोन संस्कृतींशी संबंध जोडला आहे. आपली श्रुति-स्मृति-पुराणोक्त ही संस्कृती सोडून देऊन’ आधुनिक विज्ञानाचा पुरस्कार करून अपटुडेट व्हा. आपले ज्ञान काळाशी सुसंगत व आजच्या तारखेपर्यंत ताजेतवाने ठेवण्यावर भर दिला आहे. आज या कम्प्युटरच्या युगात त्याची किती गरज आहे हे आजची पिढी जाणते. एका एका महिन्यात तुमचं ज्ञान हे भूतकाळ होऊन जातं. अशी परिस्थिती आज अनेक क्षेत्रात आहे. त्यामुळे स्वतःचे ज्ञान जो कालानुरूप सतत ताजंतवानं ठेवतो त्याचीच प्रगती होईल. हे आजचं वास्तव सावरकरांनी किती वर्षांपूर्वी सांगून ठेवलं होतं.

आपल्या राष्ट्राचा इतिहास, त्या इतिहासापासून घेतलेला बोध आणि त्या बोधापासून भविष्यकाळाचा विचार करून वर्तमान काळात टाकलेली पावलं यातून राष्ट्र घडत असतं असे सावरकर मानत.

त्यातूनच सावरकरांनी राष्ट्र उभारणीसाठी जी तत्वं सांगितली त्या तत्त्वांशी अनेक राजकीय लोकांनी संघर्ष केला. सावरकरांचा प्रमुख संघर्ष हा मोहनदास करमचंद गांधी (त्यावेळी ते महात्मा नव्हते) यांच्याशी झाला. अहिंसा आणि सहिष्णुता यांच्या निरुपयोगीपणामुळे आपल्या अखंड भारताचे लचके तुटत गेले. आता अजूनही अहिंसा आणि सहिष्णुता यांचा पुरस्कार करत राहिलो तर अजूनही भारताची शकले होण्यास वेळ लागणार नाही. सावरकरांचे हे म्हणणे भारताच्या फाळणीने खरे ठरवले.

माझ्या मते महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर दोघेही आपापल्या विचारसरणीमध्ये बरोबर असू शकत होते. सावरकरांनी तरुणांच्या मनात स्वातंत्र्यलढ्याविषयी स्फुल्लिंग जागृत केले. तरुणांना स्वातंत्र्यलढा उभारण्यासाठी उद्युक्त केले.

उलट पक्षी महात्मा गांधींनी सर्वसामान्य माणसाच्या मनात स्वातंत्र्याची उर्मी निर्माण केली. रोजच्या जीवनात पोटासाठी संघर्ष करणाऱ्या माणसाला स्वातंत्र्याचे फारसे कौतुक नव्हतेच. कारण तो सामान्य माणूस कधीच स्वतंत्र नव्हता. त्याच्या मनात स्वातंत्र्याविषयी आपुलकी निर्माण करणे त्याला स्वातंत्र्यलढ्याचा सैनिक बनवणे हे अत्यंत अवघड काम होते. महात्मा गांधींना त्या कामात यश मिळाले.

स्वतःच्या जीवावर उदार होऊन स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करण्यासाठी एखाद्या माणसाला उद्युक्त करणे हे त्याहून अवघडच काम होते. माणसाला स्वतःचे जीवन, स्वतःचे प्राण सर्वात महत्त्वाचे वाटतात. परंतु त्याचा सुद्धा त्याग करण्यास माणूस जेव्हा तयार होतो तेव्हा, तो एका खूप प्रभावी विचारांनी भारून गेल्याशिवाय नाही. हे विचारांचं भारलेपण सावरकरांनी तरुणांच्या मनात निर्माण केलं. ते तरुणांच्या मनामध्ये निर्माण होण्यासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्याचा पट तरुणांच्या समोर ठेवला. १८५७ चे स्वातंत्र्य समर पासून ते माझी जन्मठेप पर्यंत त्यांच्या जीवनातील क्षण आणि क्षण आणि प्रत्येक कृती ही तरुणांना स्वातंत्र्यासाठी जागवणारी होती.

अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळणार नाही याबाबत सावरकरांचे मत ठाम होते. अनेक काँग्रेस नेत्यांचे असेच मत होते. परंतु गांधींच्या प्रभावापुढे स्वतःचे मत त्यांना मांडता येणे शक्य होत नव्हते. सुभाषबाबूंनी काँग्रेस आणि पर्यायाने देश सोडण्याचा निर्णय घेतला. वल्लभ भाई पटेल यांनी पक्षात राहूनच थोडाफार वैचारिक संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. भगतसिंग, सुभाष चंद्र बोस, डॉ. हेडगेवार अशा अनेक व्यक्तींनी परंतु मुख्यतः पंजाब, बंगाल व महाराष्ट्र येथील अनेक नेत्यांनी विशेषतः तरुणांनी महात्मा गांधींच्या विरोधात काँग्रेसचा त्याग केला. सावरकर हे त्यातील एक प्रमुख व्यक्तिमत्व होते. महात्मा गांधींच्या नेतृत्वाला त्याकाळी ब्रिटिशांनीही खतपाणी घातले. कारण त्यांना हिंसक मार्गाने स्वातंत्र्य चळवळीचा उद्रेक झेपणारा नव्हता.

सावरकरांच्या अंदमानातील दहा-बारा वर्षाच्या तुरुंगवासामुळे आणि त्यानंतरही काही विशिष्ट अटींवरच त्यांची सुटका झाल्यामुळे त्यांना नंतरच्या काळात राजकीय चळवळीवर प्रभाव ठेवता आला नाही. सावरकर अंदमानातून सुटून येईपर्यंत महात्मा गांधींचे नेतृत्व ब्रिटिशांनी खतपाणी घालून खूप मोठे बनवले. अर्थात महात्मा गांधींची समाजाभिमुखता आणि त्यांचे आंदोलनाचे विविध प्रयोग समाजमनाशी जोडणारे असल्यामुळे त्यांचा प्रभाव वाढणे सहाजिक होतेच.

बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र देशाची मागणी केली त्याला महात्मा गांधींनी स्पष्टपणे व प्रखर विरोध कधीच केला नाही. त्यामुळे अनेक नेते महात्मा गांधींवर नाराज होते. सुरुवातीच्या काळात गांधींनी फाळणीला नकार दिला असला तरी अंतिमतः त्यांनी त्यास मंजुरी दिली. यासाठी ब्रिटिशांनी जे काही राजकारणाचे खेळ केले ते यशस्वी ठरले. हे सर्व रत्नागिरीत राहून सावरकर पहात होते. खाजगीत ते त्यांच्या सहकाऱ्यांशी नाराजीने बोलले ही असतील. परंतु त्यात ते प्रत्यक्ष सहभाग घेऊ शकत नव्हते. स्वातंत्र्यानंतर मात्र त्यांनी त्यावर अनेक टीकात्मक आणि प्रखर विरोधी लेखन केले. परंतु फाळणी होऊन गेली होती. जे काही वाईट घडणे शक्य होते ते सर्व घडून गेले होते. त्यांना निष्प्रभ करण्यासाठी काँग्रेस पक्षाने त्यांना गांधी हत्येच्या खटल्यात गुंतवून त्यांचा समाज मानसावरील प्रभाव कमी करण्याची यशस्वी खेळी केली.

परंतु एकंदरीतच सावरकर राजकारणामध्ये निष्प्रभ ठरले असले तरी सामाजिक चळवळीमधील त्यांचे योगदान खूपच वरच्या दर्जाचे होते. त्यांच्या अनुयायांना व समर्थकांना सुद्धा सामाजिक सुधारणांमधील त्यांचे प्रखर विचार आणि तथाकथित हिंदू सवर्णांच्या विरोधात केलेले लिखाण आणि आंदोलन हे झेपण्यासारखे नव्हते. त्यामुळे हे सर्व समाजकार्य आणि प्रखर लेखन समाजापुढे हिरीरीने मांडून प्रबोधनात्मक कार्य करण्याचा आणि त्यांचे आंदोलन पुढे चालू ठेवण्याचा त्यांच्या अनुयायांनी सुद्धा कधी प्रयत्न केला नाही.

शेवटी आपला समाज सुद्धा समाजसुधारकांची तत्वे विसरून तस्वीर किंवा मूर्ती किंवा पुतळ्यात किंवा अगदी देवळात सुद्धा बसवून त्यांच्या नावाचे टाळ कुटत राहणे आणि तत्त्वांचा विसर पाडणे यामध्ये वाकबगार आहे. प्रश्न प्रत्येकाच्या वैयक्तिक विचारसरणीपर्यंत येऊन पोहोचतो.

महापुरुषांची तत्वं लक्षात घेणार का त्यांच्या नावाचे टाळ कुटत राहणार हे आपण ठरवायचं आहे. नाहीतर आजची पिढी ही त्या माणसांना विसरून जाईल त्या तत्वांना विसरून जाईल आणि मग सावरकर यांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या संस्कृतीचा ऱ्हास व्हायला जास्त वेळ लागणार नाही. आपल्याच संस्कृतीच्या ऱ्हासाचे कारण आपल्याला व्हायचं आहे काय? हे ज्यानं त्यानं ठरवायची वेळ आलेली आहे असं मला वाटतं.

© श्री सुनील देशपांडे

पुणे, मो – 9657709640 ईमेल  : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावरकर आणि मी : लेखांक १ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? विविधा ?

सावरकर आणि मी : लेखांक १ ☆ श्री सुनील देशपांडे 

(६ जानेवारी १९२४: रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे अंदमानातून सुटून मायदेशी परतले. त्यानंतर त्यांचे पुढील वास्तव्य बारा तेरा वर्षे रत्नागिरी येथे पण नजर कैदेत होते.

सावरकरांचा समाज सुधारक हा पैलू प्रामुख्याने मला आवडलेला व त्यांच्या रत्नागिरीच्या वास्तव्यात त्यांनी सर्व समाजापुढे मांडलेला आहे त्याबाबत माझे विचार.)

त्यांची माझी प्रत्यक्ष कधीही भेट झाली नाही. याची देही याचि डोळा त्यांना प्रत्यक्ष कधी पाहिलेही नाही. तरीसुद्धा त्यांची माझी पहिली भेट झाली ती मी एसएससीला म्हणजेच अकरावीला असताना १९६५-६६ मध्ये.

हो, ही भेट होती त्यांच्या एका निबंधातून झालेली. त्या निबंधाचे नाव होते ‘मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव’ हो तेच ते, विनायक दामोदर सावरकर. अकरावीला असताना मराठीच्या पुस्तकात ‘मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव’ हा आम्हाला धडा होता. माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा तो एक जीवनाचा धडा होता. आमच्या मराठीच्या आपटेबाईंनी हा धडा जरी आम्हाला शिकवला होता, तरी तो माझ्या डोक्यात बसला तो माझ्या आईने मला शिकवला तेव्हा! तसं पहायला गेलं तर माझी आई आणि सावरकर यांच्यात वैचारिक साम्य फार नव्हतं. त्या धड्यामध्ये सावरकरांनी परमेश्वराची जी संकल्पना मांडली आणि जी माझ्या डोक्यात रुजली ती वस्तुतः आमच्या आईला मान्य असण्याचं काही कारण नव्हतं. पण तरीही स्वतःची मतं लादण्यापेक्षा त्या धड्यामध्ये सांगितलेला विचार उत्तम प्रकाराने समजावून सांगणे ही हातोटी आमच्या आईमध्ये असल्याने, त्या निबंधाचे माझ्या मनामध्ये जे बीज पेरलं गेलं त्यातून माझ्या अनेक विचारांची जडणघडण होत गेली.

त्या निबंधाची मांडणी मला खूप आवडली. ज्या विषयाची आपल्याला मांडणी करायची आणि जी बाजू आपल्याला पटवून द्यायची आहे, त्याच्या विरोधी बाजू पूर्वार्धात पूर्णपणे पटवून द्यायची आणि उत्तरार्धात त्या सर्व पूर्वार्धातील मुद्द्यांचे खंडन करायचे. अशा पद्धतीचे त्या निबंधाचे लेखन माझ्यावर प्रभाव पाडून गेले.

ईश्वराच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं करणे ही त्या वेळेला मला क्रांतिकारी कल्पना वाटली. कारण त्या वेळेपर्यंत ईश्वर आणि त्याचं अस्तित्व, हे लहानपणापासून झालेल्या संस्कारातून आपण गृहीतच धरलेलं असतं. तसं मी ते गृहीतच धरलेलं होतं. सावरकरांनी माझं ते गृहित मुळापासूनच उखडून टाकलं प्रथमच.

सावरकरांच्या म्हणण्यानुसार मनुष्याचा देव म्हणजे, देव प्रसन्न व्हावा म्हणून माणसे जी काही कर्मकांडं करतात, ती कर्मकांडं करण्यासाठी भाग पाडणारा देव. हा देव त्यांना सर्वथा अमान्य आहे. नवसाला पावणारा देव, भक्ताच्या हाकेला ओ देणारा देव, भक्ताच्या नैवेद्याने प्रसन्न होणारा देव, भक्ताच्या नामस्मरणाने. त्याच्या हाकेला धावून जाणारा देव, किंबहुना देव नावाचं कोणतंही अस्तित्वच त्यांना (आणि अर्थात मलाही) अमान्य आहे. त्यामुळे ज्याला अस्तित्वच नाही अशा देवाला प्रसन्न करून घेण्याची कोणतीही कृती ही निरर्थक आहे या मतावर ते ठाम आहेत. देवाने मानवासाठी काहीही निर्माण केलेलं नाही आणि देव मानवासाठी काहीही करीत नाही. या विश्वामध्ये नैसर्गिक प्रक्रियेने जे काही निर्माण झालं आहे त्या निर्मितीचा उपयोग मनुष्य स्वतःच्या फायद्यासाठी, सुखासाठी आणि उपयोगासाठी करून घेत असतो. ही कृती करीत असताना तो स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करतो, विकास करतो आणि या निसर्गकृती मागील कार्यकारण भाव जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. पुढील पिढ्यांसाठी संशोधनाचे विश्व अधिकाधिक विस्तारून ठेवतो. या निसर्गाच्या अर्थात या संपूर्ण विश्वाच्या निर्मिती मागे काही कार्यकारण भाव असेल काही सूत्रबद्धता आणि नियमबद्धता असेल आणि त्या सर्वांना बांधून ठेवणारी शक्ती असेल व त्या शक्तीलाच जर आपल्याला देव समजायचं असेल तर, त्या विश्वाच्या देवाचीच पूजा केली गेली पाहिजे. मनुष्याच्या देवाला पूर्णपणे नाकारलं पाहिजे. हा निसर्ग काही विशिष्ट नियमाने बद्ध आहे त्या नियमांची माहिती करून घेणे त्याचं सर्वतोपरी ज्ञान मिळवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणे त्यासाठी संशोधन कार्यात रममाण होणे हीच त्या विश्वाच्या देवाची पूजा असं ते मानतात. म्हणूनच त्यांनी कोणतेही पूजा पाठ आणि कर्मकांडांचं समर्थन केलं नाही. पुरस्कारही केला नाही. उलट त्याचा विरोध केला. निषेध केला. ज्या कृती मागे निश्चित कार्यकारण भाव नाही नैतिक विचार नाही आणि मानवतेच्या मूल्यांचा विचार नाही अशा सर्व गोष्टींना त्यांनी विरोध केला. मग त्या गोष्टी हिंदू धर्मात असोत वा दुसऱ्या कोणत्याही धर्मात असोत. देवपूजेपासून देवतांचे स्तोम वाजवणाऱ्या मंदिरे, व्रतवैकल्ये, ज्योतिष शास्त्र, मुहूर्त, यात्रा, जत्रा, उत्सव या सर्वांना त्यांनी विरोध केला आहे. माणसा माणसांमध्ये भेदभाव करणाऱ्या चातुर्वर्ण्य, जातीयवाद अशा सर्व गोष्टींना कडाडून विरोध केला आहे. धर्मशास्त्राच्या आधारे समर्थन करत असलेल्या श्रृती आणि स्मृतींना त्यांनी नाकारलं आहे. त्यासाठी त्यांचे इतर बरेच साहित्य वाचले पाहिजे. किमान त्यांचे विज्ञाननिष्ठ निबंध वाचले पाहिजेत. त्यांचे क्ष किरणे नावाचे त्यांच्या निवडक लेखांचे निघालेले पुस्तक ते तरी वाचले पाहिजे. खरं म्हणजे या निबंधानंतर एसएससी नंतरच्या सुट्टीमध्ये मी झपाटल्यासारखा समग्र सावरकर वाङ्मय वाचत होतो. माझ्या आठवणी प्रमाणे त्यावेळी पाच-सहा खंड होते. ते मी वाचून काढले आणि त्यांच्यासारखाच मी निरीश्वरवादी झालो. सावरकर व आगरकर या दोघांनी हिंदू धर्म हा भटाभिक्षुकांचा धर्म नाही हे पोट तिडकीने ठामपणाने व ओरडून ओरडून सांगितले. हिंदू हा धर्म नसून ती एक जीवनशैली आहे. त्याला रूढी आणि कर्मकांडांच्या बंधनात जखडून त्याचा मूळ जीव घोटण्याचा प्रयत्न करून त्या जीवनशैलीचा धर्म बनवला गेला. तिथेच आपल्या संस्कृतीच्या, जीवनशैलीच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. सावरकरांचा हिंदू धर्म म्हणजे तथाकथित धर्म मार्तंडांच्या पाशात जखडलेला हिंदू धर्म नव्हताच. सावरकरांचे हिंदुत्व हे तथाकथित पारंपरिक सनातनी हिंदुत्ववादी लोकांच्या हिंदुत्वापेक्षा अत्यंत वेगळं होतं आणि ते तथाकथितांना पटण्यासारखं आणि पचण्यासारखं नव्हतं आणि नाही. अर्थात या सर्वांचा विचार मांडण्यासाठी अजून एका लेखाचे प्रयोजन करावे लागेल असे मला वाटते. पण एकंदर सावरकरांच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाल्यानंतर मला सुचलेल्या कवितेच्या ओळी पुढे देत आहे.

 भावी काळ कसा असेल अपुला ठाऊक ना मानवा.

केंव्हा देव जगी करेल प्रलया माहीत नाही कुणा.

भूकंपातुन जीव आणिक किती जातील पृथ्वी तळी.

आगी आणिक वादळामधुनही जीवीतहानी किती.

देवा प्रार्थियले आम्ही जरि किती याहून नाही गती.

विश्वा वाचविण्या समर्थ जगती वैज्ञानिकाची मती.

— सुनील देशपांडे.

© श्री सुनील देशपांडे

पुणे, मो – 9657709640 ईमेल  : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ देव आहे तरी का? — लेखिका : सौ सुनंदा म जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

🌸 विविधा 🌸

☆ देव आहे तरी का? — लेखिका : सौ सुनंदा म जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

देव आहे तरी का?

जगात सर्वत्र लोक खूप संभ्रमात आहेत. गोंधलेले आहेत की, इतकी सगळी क्रूरता समाजात उघडपणे वावरत असताना, देव गप्प का? देव आहे तरी का? आणि तो असला तर आंधळा-बहिरा-मुका आहे का?

हल्ली लोकांचे स्वच्छंदी वागणे, घसरती सामाजिक नैतिक मूल्ये, देशादेशामधील युद्धे, देशांतर्गत विविध गटांमध्ये वैर, गल्लोगल्ली घडत असलेले अपराध, अपहरण, घरफोड्या, लुटालूट इ. सर्व पाहून लोकांना आश्चर्य तर वाटतेच पण त्यापेक्षा शंकाच जास्त वाटते की, हे सर्व देव का घडू देतो? त्याला हे दिसते की नाही? तो काही करत का नाही? तो आंधळा-बहिरा-मुका आहे का? तो आहे तरी का नाही?

अर्थात आपल्या सर्वांना हे माहित आहे की, देवाने काही ते सर्व दुष्कृत्य सुरू केलेले नाही. हे सर्व अनर्थ वारंवार घडतात कारण आपण देवाकडे दुर्लक्ष करतो. आज समाजात दुष्टता आहे, अन्याय आहे, कारण लोक स्वार्थी, लोभी, कामलोलुप, हावरे व अधाशी आहेत. आपली खरी समस्या ही आहे की, हल्ली मोठ्यामोठ्या शहरातील सामाजिक स्थिती गुन्हेगार निर्माण व नियंत्रित करीत आहेत.

हे गुंड बँका, लुटतात. पैसे घेऊन कोणाचाही खून करतात, जाळपोळ करतात, व बलात्कार करतात. हे काही एका दिवसात जादूने निर्माण झालेले नाही. ते तुमच्या आमच्या घरातच निर्माण झालेले आहेत. कदाचित आपल्या शाळा-कॉलेजमध्ये ते शिकले असतील. आपल्याच समाजात वावरत मोठे झाले. कदाचित त्यांच्या लहानपणापासून लहान-मोठ्या चुकांसाठी आपण त्याला क्षमा करीत आलो. शेजारच्या कंपौंडमधून पहिल्यांदा जेव्हा मुलांनी आंबा तोडून आणला तेव्हा, आपण म्हणालो, “जाऊ द्या! लहान आहेत! ” त्यांच्या दुसऱ्या-तिसऱ्या अपराधाकडेही आपण दुर्लक्ष केले. कारण त्यांना आपण अजूनही शिक्षण-प्रशिक्षण देत आहोत, अशी आपली धारणा होती. हळूहळू वाढत्या वयाबरोबर त्यांच्याकडून सहज घडणाऱ्या अपराधांचे स्वरूपही अधिक गंभीर झाले. ट्रेनमधील उपकरणे तोडणे, सीट-कव्हर फाडणे, खरेदीच्या निमित्ताने दुकानातील वस्तू उचलणे, लायब्ररीच्या पुस्तकातील पाने फाडणे, कट्ट्यावर बसून मुलींची छेड काढणे, मारामारी करणे ह्या सर्व गोष्टी त्यांच्या तारुण्यातील उत्साहाचे मात्र निरूपद्रवी प्रकटन आहे, असे आपल्याला वाटते. गंभीर गुन्हाची नोंद होऊन केस चालली तरी कोर्ट त्यांना वीस वर्षाची कठोर शिक्षा न करता, वय लहान असल्यामुळे फक्त दोन वर्षे तुरुंगात ठेवण्याचा दंड देत असे. त्यावेळी ही देव आंधळा-मुका-बहिरा होता का? देव होता तरी का?

आपल्या नैतिकतेचा कणा असा मोडला जात होता. ऋषी- संस्कृतीचा अनादर केला जात होता. राष्ट्रीय सन्मान धुळीला मिळत होता. आपल्या आध्यात्मिक वैभवाचा अपमान होत होता. आणि हे करणारे आपणच विचारत होतो, ” अरे! देवा आहे कोठे? तो आंधळा-बहिरा-मुका आहे का?

मिसरूड फुटायला लागली व तरुण दाढी करायला लागला म्हणजे त्याला देशातील लक्षावधी लोकांचे भवितव्य ठरवण्याची योग्यता आपोआप प्राप्त होत नाही. सामाजिक व राजनैतिक क्षेत्रात कार्य करण्याचे योग्य प्रशिक्षण तरुणांना मिळाले पाहिजे. त्यांच्यात असणारा उत्साह दांडगा आहे. महत्त्वाकांक्षा नक्की महान आहेत. पण फक्त तेवढ्यासाठी त्यांचा उदोउदो होणं आश्चर्यकारक वाटत. ज्येष्ठ लोकांमधील समृद्ध अनुभवाची उणीव ते कशी भरून काढतील?

अपरिपक्व व अनुभवहीन असे पुढारी समाजाचे नेतृत्व करू लागतात. आणि सर्व क्षेत्रात गोंधळ माजतो. व्यापार, अर्थव्यवस्था, उत्पादन, शिक्षण, धर्म संस्कृती… कोठेच काहीही नीट राहत नाही. महागाई उच्चांक गाठते, बेरोजगारी वाढते, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई नेहमीचीच बाब होते. आपणच हे घडवून देतो आणि वर विचारतो, “अरे! देवा आहे का? असला तर तो आंधळा-बहिरा-मुका आहे का?

आपल्या देशातील तरुणांवर आपण अन्याय करीत आहोत. आईच्या कुशीतून घाईघाईने काढून त्याला पार्लमेंटमध्ये, डायरेक्टरच्या खुर्चीत आणि गल्लीबोळातील मंडळ राजकारणाच्या नेतृत्वाच्या आसनांवर बसवीत आहोत. आणि ते ज्या अनियंत्रित, बेफाम तरुणांच्या जमावाला उद्युक्त करून विनाशाच्या दिशेने घेऊन जातात. त्यांच्यापेक्षा हे काही अधिक शहाणे नसतात. हे स्वतः बेताल, बेफाम आणि बेपर्वा असल्यामुळे परिणाम विनाशकारी असतात.

बंद, दंगली जाळपोळ इ. च्या माध्यमातून लोकांना खूप गोष्टींचा त्याग करावा लागतो. पण त्यातून काहीही सामाजिक उपलब्धी होत नाही. प्रगती होत नाही. गरिबी, उपासमार वाढते. इतकेच नव्हे राष्ट्रीय सुरक्षिततेलाही तडा जातो. आणि आपण विचारतो, “देव आहे का? तो आंधळा-बहिरा-मुका आहे का?

स्वातंत्र्याच्या संकल्पनेत आपण हास्यस्पद मूर्खपणाच्या परिसीमेपर्यंत ताणले आहे. पाहिजे आहे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, Freedom is not in doing what you like, but in liking everything you have to do. आवडेल ते करायला मिळणे नव्हे, तर जे करावे लागत आहे त्यात आवड निर्माण करणे म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्याच्या नावाखाली ज्याला जे करावयाचे आहे ते तो करतो. जे बरळायचे आहे ते बरळतो. आपल्यासमोर काही आदर्शच नाहीत. आपल्यात काही शिस्तच नाही. देव नाहीच असं आपण वागतो आणि देव आहे का? असलाच तर तो काय आंधळा-बहिरा-मुका आहे का? असे विचारतो.

काहीही करून समाजाने आता भानावर आले पाहिजे. आणि तेही लवकरात लवकर शाळा-कॉलेजामधून मुलांना काय शिक्षण मिळत आहे, हे पालकांनी पाहिले पाहिजे. पाल्याच्या प्रत्येक कृतीसाठी पालकांनी स्वतःला जबाबदार समजले पाहिजे. समाजात अपराध्यांची एक नवीन जात निर्माण होऊ लागली आहे. जिच्यामुळे असंख्य लहान मुले भिकारी बनवत आहेत, अपराधी बनवत आहेत, अपंग बनवत आहेत, बळी जात आहेत.

हल्लीची मुले देवळात जायला तयार नाहीत. त्यांना धर्माबद्दल आपुलकी नाही. संस्कृती बद्दल जाणून घेण्याची इच्छा नाही. अध्यात्मिक मूल्यांची चाड नाही, असे आपण रोजचेवर फार ऐकतो. आणि असाहाय्यपणे खांदे उडवून गप्प बसतो. ज्या संस्कृतीचे नेतृत्व राजकीय पुढाऱ्यांकडून झाले पाहिजे. तिचीच लक्तरे ते पार्लमेंटमध्ये सर्रास उडवित आहेत. आणि आपण म्हणतो…

कोणत्याही समाजाची प्रगती शांती शक्ती समृद्धी आणि संपत्ती, तसेच आरोग्य, शिक्षण व कायदा- सुव्यवस्था हे सर्व समाजातील दक्षतेनेच शक्य आहे. जे तरुण निर्धारित नियमांचे उल्लंघन करतात व त्यामुळे सामाजिक विनाशाला आमंत्रित करतात, ते अत्यंत भयंकर अपराधी मानले गेले पाहिजेत. ते ‘खोडकर मुलं’ नव्हेत. सुधारणेच्या पलिकडील ‘अपराधी’ आहेत. त्यांचे लाड करता कामा नये. त्यांना क्षमा करून उपयोग नाही. त्यांच्या अपराधांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे विनाश ओढवणे आहे.

या, स्वयंशिस्त व आत्मसंयम असणाऱ्या लोकांचा एक नवा देश निर्माण करूया. जो शक्तीने तरूण आणि बुद्धीने ज्येष्ठ असेल. सर्वांनी परस्पर प्रेमाने एकत्र येऊन श्रम करूया. उत्पादने वाढवूया. न्यायाने प्रत्येकाला त्याच्या अधिकारानुसार समृद्धी आणि ऐश्वर्याचा वाटा देऊया.

नक्कीच, देवसुद्धा मग आंधळा-बहिरा-मुका राहणार नाही. तो आहे. तो आता येथे आहे. तो नेहमीचआपल्याबरोबर आहे.

०००००

लेखिका : सौ सुनंदा म जोशी

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वटपौर्णिमेचे बदलते स्वरूप ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆

सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

?विविधा ?

☆ वटपौर्णिमेचे बदलते स्वरूप ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆

वट पौर्णिमा हा महाराष्ट्र, गोवा या पश्चिम भारतीय राज्यांमध्ये विवाहित महिलांनी साजरा केलेला हिंदू उत्सव आहे.

अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राज्याची कन्या सावित्री हिचा शाल्व राजा धृमत्सेन ह्याचा पुत्र सत्यवान ह्याच्या शी विवाह झाला. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहित असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला.

सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसा होते तेव्हा सावित्रीने उपवास करून व्रत केले. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्रीचे व्रत करतात.

भरतखंडात प्रसिद्ध असलेल्या पतीव्रतांपैकी सावित्री ही आदर्श मानलेली आहे. तसेच तिला अखंड सौभाग्याचे प्रतीकही मानले जाते. सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे; म्हणून स्त्रियांनी या व्रताचा आरंभ केला.

पूर्वी बायकांना घराबाहेर जायची परवानगी न्हवती. सणावारांच्या मुळे त्यांना घराबाहेर जाऊन पूजाअर्चा करून चांगले वस्त्र परिधान करून सख्यांना भेटायची संधी मिळावी हा हेतू साधून हे व्रत केले जायचे.

तीस वर्षा पूर्वी मला माझ्या मैत्रिणी बरोबर हे व्रत करायला जायची संधी मिळाली. गणपतीच्या मंदिरात वटवृक्ष असल्यामुळे वटपौर्णिमेच्या पूजे साठी बायकांची तिथे खूप गर्दी झाली होती.

मंदिराबाहेर पाच फळे व फुले विकायला विक्रेते बसले होते. खरे तर ती फळे खूप कोवळी होती व खाण्या लायक ही न्हवती तरीही ती सुवासिनींची ओटी भरण्यासाठी विकत घेतली जात होती.

पूजेसाठी रांगा लावून सगळ्या बायका थांबल्या होत्या. मधल्या वेळात काही बायका आपल्या नवऱ्या व सासूबद्दल कुरबुरी व तक्रारी सांगत होत्या. सासरी त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल ही सांगत होत्या. तिथे आलेल्या काहीजणी आपल्या संसारात तितक्याशा सुखी न्हवत्या व एक रीती रिवाज म्हणून व्रत करत होत्या. भरजरी साड्या, दागिने व गर्दी ह्या मुळे कधी एकदा पूजा संपते असेच बहुतेक जणींना झाले होते. नंतर नंतर गर्दी एवढी वाढली की वडा भोवती प्रदक्षिणा घालतांना एकमेकींचे धागे वडा भोवती गुंडाळून कशीबशी पूजा पूर्ण केली गेली. त्यात काही जणी मनापासून तर काही एक रीत म्हणून किंवा लोकांना काय वाटेल पूजा केली नाहीतर म्हणून तिथे पुजेसाठी आल्या होत्या.

खरतर नवऱ्या बायकोच्या नात्यात संवाद, विश्वास, आणि समजूतदारपणा महत्त्वाचे आहे. नवरा बायकोचे नाते हे प्रेमाने, आपुलकीने, आणि एकमेकांचा आदर करून टिकून राहावे व अडीअडचणीच्या वेळी त्यांनी एकमेकांना साथ द्यावी हे महत्वाचे आहे. नवऱ्यासाठी व्रत करणे उपवास करणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.

नंतरनंतर ह्या पूजेला बदलते स्वरूप आले. बाजारात वडाच्या फांद्या विकत मिळू लागल्या व सुवासिनी ह्या फांद्या विकत घेऊन त्याची पूजा करू लागल्या. काहीकाही जणी घरात फांदी विकत आणून दहा पंधरा जणी एकत्र जमून पुजा करून फराळ करू लागल्या. काही बायका आपल्या सोयीप्रमाणे कामाच्या ठिकाणी वडाचे झाड शोधून हे व्रत पुर्ण करू लागल्या.

काही घरात ज्यांची मुलगी परदेशात आहे ते आभासी पद्धतीने म्हणजे व्हिडिओ कॉल करून पूजा करून हे व्रत करायच्या.

आता तर ह्या पूजेला एक इव्हेंट म्हणून पाहायला लागले आहेत. सोसायटी मध्ये सुवासिनी एकत्र जमून ही पूजा करतात. सेल्फी, फोटोचा कार्यक्रम व कुठे तरी बाहेर हॉटेल मधे उपवासाचे खाणे हे सगळे आठवड्या पूर्वीच नियोजन करून हे व्रत केले जाते.

ह्या कार्यक्रमात ड्रेस कोड, एका प्रकाराच्या साड्या परिधान करणे एकत्र जमुन गुजगोष्टी करणे हे हि तितकेच महत्वाचे असते.

एकूण काय पूर्वीचे व्रत असो किंवा आत्ताचे सेलिब्रेशन असो ह्यात सुवासिनींनी एकत्र येणे आपले सुखदुःख एक मेकांना सांगणे, आपले मन मोकळे करणे एकमेकींना कठिण प्रसंगी आधार देणे, वेळ प्रसंगी एकमेकींना मदत करणे एवढे साध्य झाले तरी वटपौर्णिमा खऱ्या अर्थाने साजरी झाली असे म्हणता येईल.

© सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

साहाय्यक प्राध्यापिका, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी , कोंढवा पुणे

संपर्क :  सन युनिव्हर्स फेज २, एम ५०३, नवले ब्रिज जवळ, नऱ्हे, पुणे.

फोन   : ७५०६२४३०५०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ देसी डोळे परी निर्मिसी… — लेखक – श्री श्रीनिवास बेलसरे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

🔅 विविधा 🔅

देसी डोळे परी निर्मिसी… — लेखक – श्री श्रीनिवास बेलसरे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर  ☆

देसी डोळे परी निर्मिसी, तयापुढे अंधार…

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात जुना सिनेमा मराठी होता ही गौरवास्पद बाब चित्रपटांबद्दलच्या चर्चेत अनेकदा दुर्लक्षित राहते. तो होता खुद्द दादासाहेब फाळके यांनी १९१३ साली दिग्दर्शित केलेला ‘राजा हरिश्चंद्र’. तो मूकपट होता तर पहिला मराठी बोलपट आला १९३२साली,  स्व. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला ‘अयोद्ध्येचा राजा.’

परदेशात गाजलेल्या भारतीय चित्रपटांबद्दलच्या चर्चेतही  अनेकदा असेच होते. आपल्याला वाटते मराठी चित्रपट म्हणजे फक्त महाराष्ट्रात चालणारे सिनेमा. राजकपूरचा ‘मेरा नाम जोकर’ रशियात लोकप्रिय झाल्याने केवळ तोच परदेशात जास्त लोकप्रिय झालेला अभिनेता होता असा सर्वसाधारण समज असतो.  पण मराठी सिनेमांचाही गौरवशाली इतिहास आहेच. दुर्दैवाने त्याचा तितका गवगवा झालेला नाही.

आता ‘प्रपंच’ असे अत्यंत घरगुती नाव असलेला मराठी सिनेमा चक्क चीनमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता हे कुणाला खरे वाटेल का? पण ते सत्य आहे. हल्लीसारखा तेंव्हा चीन स्वस्त पण तकलादू वस्तूंसाठी किंवा त्याच्या राक्षसी विस्तारवादासाठी प्रसिद्ध नव्हता! तेंव्हा चीन प्रसिद्ध होता तो प्रचंड लोकसंख्या आणि विचित्र मांसाहारी पदार्थांच्या सवयींसाठी!

तिथले सरकार कम्युनिस्टांचे, त्यामुळे एखादी समस्या समोर आली की तिचा इलाज लगेच करण्याचे धोरण. आपल्यासारखे ‘याला काय वाटेल?’ ‘तो काय म्हणेल?’ ‘बाबू गेनूसारखी न्यायव्यवस्थाच  समस्यानिवारणाच्या रस्त्यात आडवी पडेल का?’ हे प्रश्न त्या सरकारला कधीच पडत नसत. त्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी तातडीने पाउले उचलायची म्हणून आधी प्रबोधनाचे अभियान सुरु केले! आणि हेच कारण होते आपला ‘प्रपंच’(१९६१) चीनमध्ये  लोकप्रिय होण्यामागचे.

प्रपंचमध्ये दिग्दर्शकांनी त्याकाळी बहुतेक कुटुंबांत असलेल्या अपत्यांचा अतिरिक्त संख्येचा विषय हाताळला होता. चीनी सरकारला ही बाब आवडली. म्हणून त्यांनी लगेच संपूर्ण सिनेमा चीनी भाषेत डब करून घेतला! मग चीनी लोकांनी तो थियेटरबाहेर अक्षरश: मोठमोठ्या रांगा लावून पाहिला.

त्याचे असे झाले. गदिमांनी लिहिलेल्या कथेवर देव आनंदने ‘एक के बाद एक’ (१९६०) नावाचा सिनेमा काढला. अर्थात हिरो होते देव आनंद. त्याने सोबत शारदाला घेतले आणि दिग्दर्शनाचे काम राजऋषी यांच्याकडे सोपवले. सिनेमा साफ पडला. अनेकांच्या मते, देव आनंदने गदिमांच्या  कथेत खूप बदल केले होते.

मग गदिमांनी त्या कथानकावर एक कादंबरी लिहिली. ती गोविंद घाणेकरांना आवडली आणि त्यातून निघाला प्रपंच! दिग्दर्शक ठरले मधुकर पाठक आणि कलावंत होते सीमा देव, आशा भेंडे, सुलोचना लाटकर,  कुसुम देशपांडे, अमर शेख, श्रीकांत, शंकर घाणेकर, जयंत धर्माधिकारी.

कथा, पटकथा, संवाद सगळे गदीमांचेच होते. सिनेमा गाजला. त्याला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रीय पारितोषिक ‘स्वर्णकमल’ मिळाले. याशिवाय सर्वोत्तम फिचर फिल्मसाठीचे ‘गुणवत्ताधारक सिनेमाचे’ तिस-या क्रमांकाचे प्रमाणपत्रही मिळाले.

प्रपंचमध्ये गदिमांनी लिहिलेले एक भजनवजा गीत होते. आजही ते रसिकांच्या मनात अजरामर आहे. सुधीर फडकेंनी अतिशय भावूकपणे गायलेल्या या गाण्याला संगीतही त्यांचेच होते. विषय मात्र वेगळाच होता. जसे आपले काही संत महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठूरायाला काहीही बोलू शकतात, कधी तर शिव्याही देतात आणि तरीही त्यांचे त्यांच्या ईश्वराशी असलेले अत्यंत लडिवाळ नाते तसेच टिकून राहते तसे हे गाणे होते. यात गदिमा विठ्ठलाला फक्त कुंभार म्हणून थांबले नव्हते, त्यांनी त्याला ‘वेडा कुंभार’ म्हणून घोषित केले होते!

केवळ एखाद्या भारतीय धर्मातच शक्य असलेले भक्त आणि देवातले गंमतीशीर प्रेमळ नाते या गाण्यात फुलवले असल्याने आकाशवाणीवर सकाळच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात अख्ख्या महाराष्ट्राने हे गाणे असंख्य वेळा ऐकले आहे. गदिमांचे ते शब्द होते-     

“फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला, तू वेडा कुंभार.”

विश्वाचा ‘हा जगड्व्याळ पसारा त्या निर्मिकाने कशासाठी निर्माण केला असेल?’ असा प्रश्न प्रत्येक चिंतनशील मनाला कधी ना कधी पडलेलाच असतो. गदिमांनी तोच काव्यरूपाने खुलवून आपल्यापुढे ठेवला  आहे. ते करताना त्यांच्यातला भारतीय अध्यात्माची सखोल जाण असलेला विद्वान लपत नाही. मानवी शरीर हे पंच महाभूतातून निर्माण झाले आहे हे सत्य कविवर्य अगदी कुणालाही सहज समजेल इतके सोपे करून सांगतात. मग विठ्ठलाला म्हणतात तू ही मानवी मडकी निर्माण करून त्यांची रास रचून ठेवतोस, त्यांची संख्या तरी केवढी! अक्षरश: अमर्याद! –

माती पाणी, उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा, आभाळच मग ये आकारा. तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार.

त्यात पुन्हा भारतीय अध्यात्माने सांगितलेले सर्व प्राणीयोनीतले  मानवी जन्माचे महत्वही ते ‘आभाळच मग ये आकारा’ असे म्हणून सूचित करतात. तू एकाच साच्यातून आम्हाला घडवतोस तरीही प्रत्येकाचे नशीब वेगळेच असते. कुणा भाग्यवान माणसाच्या मुखात भगवान श्रीकृष्णासारखे लोणी पडते तर कुणा दुर्दैवी व्यक्तीच्या तोंडात निखारे पडतात. ही टोकाची विषमता, हा वरून तरी आम्हाला वाटणारा घोर अन्याय तू का सुरू ठेवतोस? बाबा, सगळे तुझे तुलाच माहित!

घटाघटांचे रुप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्याविणा ते कोणा न कळे. मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार.

जाता जाता गदिमा हेही सांगतात की अगणित कल्पांपासून देव ‘निर्मिती, वर्धन आणि विनाशाचे’ तेच काम करत आला आहे. ना त्याच्या निर्मितीला अंत, ना विनाशाला! जर सगळे नष्टच करायचे आहे तर मग ‘हे सगळे नसते उद्योग तू करतोसच कशाला’? असे एखाद्या धीट अभंगकर्त्याप्रमाणे ते विठ्ठलाला विचारतात- 

‘तूच घडविसी, तूच फोडीसी, कुरवाळीसी तू, तूच ताडीसी. न कळे यातून काय जोडीसी, देसी डोळे परी निर्मिसी, तयापुढे अंधार.’

निरीश्वरवादाचा आधारच विश्वाची वरवर वाटणारी अर्थहीनता आहे. बुद्धी असलेल्या सर्वांनाच पडू शकणारे प्रश्न गदिमांनी विचारले आहेत. पण ते कुणा भणंग संशयवाद्यांचे वितंडवाद घालण्याचे मुद्दे  नाहीत. ते एका भाविकाने आपल्या निर्माणकर्त्यासमोर निरागसपणे ठेवले प्रश्न आहेत. गाण्याचे शेवटचे वाक्य आपल्या डोळ्यासमोर निरागस अंध व्यक्तींचे अर्धवट संकोची स्मितहास्य असलेले, अश्राप चेहरे  आणते. मन गलबलते. देवाचा रागही येतो. पण तिथेच तर मेख आहे.

त्याने डोळे दिलेत आणि त्यापुढे अंधारही दिलेला आहे तो कशाला? खरे तर तेच प्रश्नाचे उत्तर आहे. निर्मात्याने आपल्या अपत्यापुढे मुद्दाम ठेवलेले ते रोचक आव्हान आहे. नुसते डोळे असून थोडाच कुणी डोळस ठरतो? मानवाने आयुष्याचा सदुपयोग करून अंतिम ज्ञानाची प्राप्ती करावी म्हणून तर समोर अज्ञानाचा अंधार ठेवला आहे. चर्मचक्षु असोत नसोत, आपणच पुरुषार्थ करून आपले ज्ञानचक्षु जागृत करणे,  सत्य जाणून घेणे यासाठीच तर सगळा उपद्व्याप असायला हवा. गदीमांनी उदाहरण जरी अंध व्यक्तीचे घेतले असले तरी हेतू माणसाचे अज्ञान स्पष्ट करणे हा आहे. त्यातूनच सत्य जाणून घेण्याचे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय अधोरेखित करणे हा त्यांचा हेतू आहे. आणि तोच तर गाण्याचा संदेश आहे. 

(हा लेख दै. प्रहारमध्ये छापून आलेला आहे. कॉपीराईट कायदा लागू. आवडल्यास लेखकाच्या नावासहच शेयर करावा.)

लेखक : श्री श्रीनिवास बेलसरे

मो. 7208633003

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com 

a.kelkar9@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ५९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ५९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र-“नव्या जागी रुजू व्हाल तेव्हा शेगावला जाऊन महाराजांचे आशीर्वाद घेऊन मगच रुजू व्हा. सगळं छान होईल. ” काकू म्हणाल्या.

मीही हेच ठरवलं होतं. काकूंच्या तोंडून जणूकांही गजानन महाराजच ‘तथास्तु’ म्हणालेत असं वाटलं आणि मी निश्चिंत झालो!

पण हे वाटतं तेवढं सोपं नसून या नंतर येणारा प्रत्येक क्षण माझी कसोटी पहाणारा ठरणार आहे याची पुसटशीही कल्पना मला नव्हती!)

काकूंचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो. बोलाफुलाला गांठ पडावी तसं त्याच संध्याकाळी मला रिलीव्ह व्हावं लागलं. सामानाची बांधाबांध, रात्रीच्या प्रायव्हेट लक्झरी स्लीपिंग कोचचं रिझर्वेशन हे व्याप होतेच.. पण सर्व स्टाफ मेंबर्सच्या आपुलकीच्या सहकार्यामुळे सगळं सुरळीत पार पडलं. अकोला ब्रँचचा चार्ज ज्या परिस्थितीत मला घ्यावा लागणार होता याचा विचार केला तर तिथं काय वाढून ठेवलं असेल याच विचाराने मी एरवी अस्वस्थ झालो असतो. पण आश्चर्य म्हणजे रात्रभर मनात या कशाचंच दडपण नव्हतं. उद्या अकोल्याला पोचल्यानंतर तातडीने चांगल्या लॉजचा शोध घेऊन, सकाळी ब्रॅंचला रिपोर्ट करण्यापूर्वी शेगावला जाणं कसं जमवायचं याचेच विचार मनात होते. मी अकोल्याला बसमधून उतरलो तेव्हा पहाटेचे चार वाजले होते. तो गुरुवार असणं हा मला एक शुभशकूनच वाटला. मनानं उभारी धरली तरी आदल्या संपूर्ण दिवसभराची दगदग आणि रात्रभराच्या प्रवासातलं जागरण यामुळे शांत झोप नव्हतीच. सगळं शरीर ठणकत होतं. पण आता झोपून चालणार नव्हतं. मी वेळ न दवडता रिक्षा करून स्टॅंडपासून जवळचंच एक लॉज गाठलं, तेव्हा पहाटेचे सव्वा चार वाजले होते.

“इथून शेगावला पहिली बस कधी आहे? ” चेकइनच्या फॉर्मॅलिटीज सुरू असतानाच मी रिसेप्शनला विचारलं.

“आत्ता पाच वाजता. नंतर साधारण दीड दोन तासांच्या अंतरानं. “

‘आता आराम करायच्या मोहात पडायचं नाही. कांहीही झालं तरी पाचची बस चुकवायची नाही.. ‘ मी स्वतःलाच बजावलं आणि…. ,

“रूमवर गरम चहा पाठवून द्या लगेच आणि गरम पाणी असेलच ना आंघोळीसाठी? ” मी विचारलं.

किमान या दोन साध्या गोष्टी माझ्यासाठी त्या क्षणी तरी अत्यावश्यकच होत्या.

“कॅन्टीन सहाला सुरू होईल साहेब.. आणि गरम पाणी सात नंतर. “

यावर बोलण्यासारखं काही नव्हतंच. नाईलाजाने मी रूम गाठली. पाय धुऊन कपडे बदलले. तातडीनं शेगावच्या बससाठी बाहेर पडणं आवश्यक होतं आणि माझं थकलेलं शरीर तर अंथरुणाला पाठ टेकायला आसुसलेलं होतं! ही बस चुकली तर सगळं वेळापत्रकच विस्कळीत होणार होतं पण त्याला आता नाईलाज होता. कारण आंघोळ न करता शेगावला जाणं योग्य वाटेना. अखेर आता तातडीने शेगावसाठी निघणं शक्य नाही हे मी मनाविरुद्ध स्वीकारलं आणि अंथरुणाला पाठ टेकली. तो एकच क्षण आणि त्यानेच जादूची कांडी फिरवावी तसं झालं! सहजच माझं लक्ष समोरच्या भिंतीकडे गेलं आणि समोर जे पाहिलं त्या दृश्यानेच गारूड केलं. मी भान हरपून पहातच राहिलो! त्या संपूर्ण भिंतीवर गजानन महाराजांचं खूप मोठ्ठं अतिशय जिवंत असं चित्र रंगवलेलं होतं! त्यांच्या मिष्कील हसऱ्या नजरेने ते माझ्याकडेच पहात असल्याचा भास मला झाला न् मी ताडकन् उठून बसलो. घड्याळ पाहिलं. साडेचार वाजून गेले होते. बॅग उचकटून मी घाईघाईने टॉवेल /कपडे घेऊन बाथरूमकडे धावलो. गार पाण्याचे चार तांबे अंगावर घेऊन आंघोळ उरकली. तेवढ्यानंही प्रवासाचा शीण निघून गेल्यासारखं मन प्रसन्न झालं. घाईघाईने कपडे बदलून, सॅक घेऊन बाहेर धावलो. रिसेप्शनजवळ किल्ली दिली आणि गडबडीने बाहेर पडलो. जवळपास रिक्षा दिसत नव्हती आणि रिक्षासाठी थांबायला माझ्याकडे वेळ नव्हता. स्टॅन्ड जवळ आहे हा अंदाज होताच. मी क्षणाचाही विलंब न लावता स्टॅंडच्या दिशेने धाव घेतली तेव्हा पावणेपाच वाजून गेलेले होते. स्टॅण्ड जवळ जाताच त्याक्षणीच्या अनिश्चित परिस्थितीत धीर न सोडता निकराचा एक शेवटचा प्रयत्न म्हणून थेट स्टॅंडवर जाऊन चौकशी करून प्लॅटफॉर्म शोधण्यात वेळ न घालवता मी बसेस् बाहेर पडतात तिथून आत जायचा निर्णय घेतला. त्या दिशेने धावत फारतर दोन-चार पावलेही गेलो नसेन तेवढ्यांत समोरून एक बस बाहेर पडताना दिसली. प्रयत्न करूनही अंधारात बस वरचा बोर्ड दिसत नव्हता. पुढे झेपावत हात हलवून मी बस थांबवायचा केविलवाणा प्रयत्न केला. बस थांबली. कंडक्टरने दार उघडलं. बस कुठं जाणाराय याची चौकशी केली. आश्चर्य म्हणजे ती शेगावला जाणारीच बस होती. मी गडबडीने बसमधे चढलो न् पाहिलं तर बस पूर्ण रिकामी होती. बसमधे फक्त कंडक्टर. जणू खास माझ्यासाठीच ती बस सोडलेली असावी तसा मी एकटाच प्रवासी आहे हे लक्षांत येताक्षणी मनाला स्पर्शून गेलेलं अतीव समाधान तोवरच्या धावपळीचा सगळा शीण नाहीसा करणारं होतं! !

आजवरच्या असंख्य प्रवासांमधला तो प्रवास मी कधीच विसरू शकणार नाही. तो प्रवास फक्त शेगावचा नव्हता. कारण मी थेट महाराजांपर्यंत जाऊन पोचल्याचा आभास निर्माण व्हावा असे अनेक अनुभव पुढे अकोल्याच्या माझ्या त्या अल्प वास्तव्यात मला आले. अकोल्यातलं जेमतेम सहा महिन्यांचं माझं वास्तव्य. या दरम्यान दर पौर्णिमेला शेगावला दर्शनाला जाण्याचे योग सहज जुळून येत असत. शेगावहून मुद्दाम आणलेली गजानन महाराजांची पोथी मी याच अल्पवास्तव्यात सर्वप्रथम वाचली, तेव्हा.. ‘ तू स्वतःच ती पोथी एकदा वाच म्हणजे तुझं तुलाच समजेल हे गजानन महाराज कोण ते‌.. ‘ हे माझ्या ताईचे शब्द शब्दश: खरे झाल्याची मनाला स्पर्शून गेलेली अनुभूति मला अनेक अर्थाने समृध्द करणारी होती! माझ्या अंतर्मनातला तो आणि गजानन महाराजांसारख्यांचं अवतारी रूप यांच्यामधलं अद्वैत मला लख्खपणे जाणवलं ते ही पोथी वाचल्यानंतरच!

‘आपल्या घरी चालत आलेला दत्तसेवेचा राजमार्ग सोडून ताई ही पोथी कां वाचते? ‘ या त्यावेळी केवळ अज्ञान आणि अहंकारातून माझ्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नाचं उत्तर ही पोथी वाचूनच मला मिळालं! किंबहुना माझ्या मनातल्या तेव्हाच्या त्या प्रश्नातली निरर्थकताही मला नेमकी जाणवली. जसा कांही तो प्रश्न मी महाराजांनाच विचारला असल्यासारखं त्या प्रश्नाचं नेमकं उत्तर महाराजांनी १९ व्या अध्यायात मला दिलं असल्याचं प्रथम वाचनातच माझ्या लक्षात आलं. या अध्यायात श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी आपल्याला भेटायला येणार असल्याचा संकेत गजानन महाराजांना मिळतो तेव्हा गजानन महाराज त्यांच्या सेवेकऱ्याला यांची पूर्वकल्पना देताना म्हणतात, ” अरे बाळा, उदयिक माझा बंधू येतो देख मज साठी भेटण्या, त्याचा आदर करावा l” ती भेट कशी तर फक्त कांही सेकंदांची! ‘एकमेकांसी पहाता, दोघे हसले तत्वता l हर्ष उभयतांच्या चित्ता, झाला होता अनिवार ll ‘ असं नेमक्या शब्दातलं त्यांच्या भेटीचे वर्णन!

ही नजर भेट होताच एकमेकांकडे पाहून स्मितहास्य आणि.. ” बंधो, आम्ही निघतो.. ” असे टेंबे स्वामी महाराजांचे अनुमती मागणारे मोजके शब्द आणि त्यानंतर गजानन महाराजांनी होकारार्थी मान हलवताच त्यांचे निघून जाणे… सगळंच अतर्क्य! श्री गजानन महाराज आणि टेंबे स्वामी महाराज दोघेही समकालीन आणि दोघांचेही नियत कार्य पूर्ण होताच त्यांची झालेली अवतार समाप्ती! या अवतारी पुरूषांच्या अवतारकार्याचे प्रयोजन आणि नियोजन या दोन्हींमागचं गूढ म्हटलं तर अनाकलनीय पण तरीही सहजसोपंसुध्दा! आता हेच पहा ना. श्री. टेंबे स्वामी अतिशय कर्मठ आणि गजानन महाराज अतिशय साधे, सोवळ्या-ओवळ्याचा कसलाच विधिनिषेध न बाळगणारे… आणि तरीही त्या दोघांमधे हे सख्य आणि हे अद्वैत कसं? हाच प्रश्न त्यांच्या सेवेकऱ्याच्या मनात निर्माण झाल्याचे जाणवताच त्या शंकेचे निरसन करताना कर्म, भक्ती आणि योग या परमेश्वरापाशी नेणाऱ्या तीनही वाटांचं गजानन महाराजांनी केलेले नेमकं निरूपण मुळातूनच वाचावं असंच आहे. माझ्या अंतर्मनातल्या ‘ तो’ चं खरं स्वरूप मला लख्खपणे जाणवलं म्हटलं ना ते हे सगळं समजून घेतल्यानंतरच, हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं!

“नव्या जागी रुजू व्हाल तेव्हा शेगावला जाऊन महाराजांचे दर्शन घ्या आणि मगच रूजू व्हा. सगळं छान होईल” असं काकू मला म्हणाल्या होत्या. मीही तेच ठरवलं होतं. म्हणूनच काकूंच्या तोंडून गजानन महाराजच ‘तथास्तु’ म्हणालेत असंच मला वाटलं होतं. यातल्या ‘सगळं छान होईल’ म्हणजे नेमकं काय आणि कसं याचा प्रत्यय, कलियुगातला एखादा चमत्कार घडावा तसाच माझ्या अकोल्यातील वास्तव्यात लवकरच मला अगदी अकल्पितपणे येणार होता‌, पण त्याबाबतीत मी स्वत: मात्र तेव्हा अनभिज्ञच होतो! !

क्रमश:…  (दर गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “भारतीय आधुनिक पंचदर्शने (Indian Renaissance)” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “भारतीय आधुनिक पंचदर्शने (Indian Renaissance)☆ श्री जगदीश काबरे ☆

हा १९व्या आणि २०व्या शतकाच्या सुरुवातीचा एक महत्त्वाचा सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक आणि बौद्धिक जागरणाचा काळ होता. याला भारतीय पुनर्जागरण असेही म्हणतात. या काळात भारतात पाश्चात्त्य विचारसरणी आणि भारतीय परंपरांचा समन्वय घडून आला, ज्यामुळे समाज सुधारणा, शिक्षणाचा प्रसार, धार्मिक सुधारणा आणि राष्ट्रीय जागृतीला चालना मिळाली.

या भारतीय ‘पंचदर्शना’ ची प्रमुख वैशिष्ट्ये:

  1. सामाजिक सुधारणा: यात बालविवाह, सतीप्रथा, विधवांच्या दुरवस्थेसारख्या सामाजिक कुरीतींविरुद्ध आवाज उठवला गेला. राजा राममोहन रॉय यांनी सतीप्रथेविरुद्ध लढा दिला आणि १८२९ मध्ये सतीप्रथा बंदी कायदा लागू झाला. ते आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखले जातात. ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवापुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले. तर आगरकरांनी विधवांच्या दुरावस्थेचे विदारक सत्य मांडले. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला.
  2. धार्मिक सुधारणा: महात्मा फुले, आगरकर, महर्षी विठ्ठल शिंदे, स्वामी विवेकानंद, काही प्रमाणात सावरकर यांनी परंपरागत हिंदू धर्मातील अंधश्रद्धा आणि कर्मकांडांना आव्हान देण्यात आले. राजा राममोहन रॉय यांनी ब्रह्मो समाज (१८२८) स्थापन करून एकेश्वरवाद आणि तर्कशुद्ध धार्मिक विचारांना प्रोत्साहन दिले. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज (१८७५) स्थापन करून वैदिक धर्माचा पुरस्कार केला आणि मूर्तिपूजा, जातीप्रथा यांना विरोध केला.
  3. शिक्षणाचा प्रसार: याच काळात पाश्चात्त्य शिक्षणाचा प्रभाव वाढला, विशेषतः इंग्रजी शिक्षण देणारे राजा राममोहन रॉय यांनी कोलकात्यात हिंदू कॉलेज (१८१७) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तर महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी प्रयत्न केले.
  4. राष्ट्रीय जागृती: टिळक, गांधी, नेहरू यासारख्या राजकीय धुरीणांनी भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची भावना आणि राष्ट्रीय अस्मिता जागृत केली. बंकिमचंद्र चटर्जी यांच्या ‘आनंदमठ’ (१८८२) मधील “वंदे मातरम्” गीताने स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा दिली. स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचा पाश्चात्त्य जगात – विशेषत: १८९३ च्या शिकागो धर्मसभेत प्रचार केला.
  5. साहित्य आणि पत्रकारिता: या काळात बंगाली, हिंदी, मराठी, तमिळ अशा प्रादेशिक भाषांमध्ये नवीन साहित्य निर्माण झाले. पत्रकारितेने सामाजिक आणि राजकीय जागृतीला चालना दिली. उदा. , राजा राममोहन रॉय यांचे “संवाद कौमुदी” आणि “मिरात-उल-अखबार” यांनी सुरुवातीच्या काळात केलेल्या जागृतीच्या कामगिरीचा विशेष उल्लेख करायला हवा.

या काळाने भारतीय समाजाला आधुनिकतेच्या दिशेने नेले आणि स्वातंत्र्यलढ्याचा पाया घातला. जातीप्रथा, अंधश्रद्धा यांना आव्हान देत सामाजिक समानतेचा विचार पुढे आला. शिक्षण आणि विज्ञानाच्या प्रगतीमुळे भारतीय समाजात नवीन विचारांचा उदय झाला. हे खरे असले तरी या ‘पंचदर्शना’ चा प्रभाव मुख्यतः शहरी आणि उच्चवर्गीय समाजापुरता मर्यादित राहिला. ग्रामीण भागात त्याचा प्रभाव कमी होता. काही सुधारणांना परंपरावादी समाजाकडून विरोधाला सामोरे जावे लागले. पण भारतीय ‘पंचदर्शना’ नी भारताला सामाजिक, धार्मिक आणि बौद्धिकदृष्ट्या नवीन दिशा दिली, हे मान्यच करावे लागेल. यामुळे भारतीय समाजात आधुनिकता, तर्कशुद्धता आणि राष्ट्रीय जागृतीचा उदय झाला, ज्यामुळे स्वातंत्र्यलढ्याला गती मिळाली.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares