मराठी साहित्य – विविधा ☆ ‘दोन पिढ्यांमधील समन्वय…’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

?विविधा ?

☆ ‘दोन पिढ्यांमधील समन्वय…’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

नवीन आणि जुन्या पिढीत वैचारिक मतभेद असणे हे अत्यंत स्वाभाविक आहे, कारण परिवर्तन हा निसर्गाचा नियमआहे.  काळानुसार जीवनशैली बदलत असते. शिक्षण, विज्ञान, जागतिकीकरण यातून नवीन विचार प्रवाह अस्तित्वात येत असतात. नवीन पिढी हे नवे विचार लवकर आत्मसात करते. तर जुन्या पिढीला हे स्वीकारायला वेळ लागतो. यातून संघर्ष निर्माण होतो आणि अनेकदा तो विकोपाला जाऊन एकमेकांबद्दल कटुता निर्माण होते, दुरावा निर्माण होतो.  याचा परिणाम कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्यावर होतो. आज कुटुंबात हा वाद आई-वडील आणि मुलं यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.  त्यामानाने काही अपवाद वगळता, आजी-आजोबा आणि नातवंडं यांच्या संघर्षाची तीव्रता कमी आहे.

पूर्वी एखाद्या समस्येचं निराकरण करण्यासाठी कुटुंबातील सदस्य अथवा समाजातील ज्येष्ठ व्यक्तींशी प्रत्यक्ष चर्चा केली जात असे. त्यामुळे वैचारिक देवाणघेवाण करताना एकमेकांशी आपुलकीचे संबंध निर्माण होत.  पण आता गुगलवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या भांडारामुळे हा संवाद हरवत चालला आहे. पाठीवरच्या हातातून मिळणारं पाठबळ व स्पर्शातून व्यक्त होणारं प्रेम, हे दृक्श्राव्य माध्यमातून होणाऱ्या शाब्दिक चर्चेतून कसं मिळणार?कोविडच्या काळात तर अगदी शिशु वर्गातील मुलांना मोबाईल हातात घेऊन शिक्षण घेणं क्रमप्राप्त झालं. आई-वडील लॅपटॉपवर ऑफिसच्या कामात गर्क आणि मुलं अभ्यास आणि नंतर मोबाईलवर गेममध्ये दंग!

पूर्वी एखादा नवीन पदार्थ करायचा असेल तर नवविवाहिता, शेजारच्या एखाद्या काकू, मावशीचा सल्ला घेत असे, माहिती घेत असे.  कालांतराने पाककृतींची पुस्तकं उपलब्ध झाली. आणि आता तर मोबाईलमुळे *कर लो दुनिया मुठ्ठी में *, त्यामुळे देशी-विदेशी कोणत्याही पाककृती काही सेकंदात तुमच्या समोर असतात आणि त्याही दृक्श्राव्य स्वरूपात! केवळ पाककृतीच नव्हे तर कोणत्याही विषयासंबंधी माहिती, मोबाईलवर क्षणात सापडते. या आभासी जगात रमताना कौटुंबिक आणि सामाजिक संवाद हरवत चालला आहे.

जागतिकीकरणामुळे कामाच्या वेळेचा आपल्या स्थानिक वेळेशी मेळ नाही. त्याचाही विपरीत परिणाम शारीरिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्यावर होत आहे.

आपल्या मुलांनी दिवसभरात चार शब्द आपल्याशी बोलावे, ही घरातील वडील मंडळींची साधीशी अपेक्षा.  पण कामाच्या या विचित्र वेळेमुळे कुटुंबातील ज्येष्ठांची साधी विचारपूस करायलाही तरूण पिढीला वेळ नाही.  मग इतर अपेक्षांची काय कथा!त्यामुळे त्यांच्या परस्पर संबंधात काहीसा दुरावा निर्माण होतो आहे.  लग्न, मुंजीसारखे समारंभ किंवा इतर सामाजिक कार्यक्रमात भाग घेणं देखील, त्यांना त्यांच्या कामाच्या वेळेनुसार, अनेकदा शक्य होत नाही. मग नातेवाईक आणि समाजातील अन्य व्यक्तींशी संबंध जुळणार तरी कसे? आपण सुखदुःखाच्या प्रसंगात कोणाकडे गेलो नाही, तर आपल्याकडे तरी कोण येणार? याचा परिणाम नवीन पिढीला एकाकीपणा बहाल करत आहे. वैफल्यग्रस्त बनवत आहे.  त्यांच्या स्वभावातील चिडचिडेपणा वाढवत आहे.

यामुळेही कौटुंबिक कलह निर्माण होऊन, भावनिक दुरावा निर्माण होत आहे.

मग या दोन पिढ्यांत समन्वय साधणार तरी कसा?कारण प्रत्येक पिढीला स्वतःचंच वागणं बरोबर वाटत असतं. त्यांची जीवनशैली व सामाजिक मूल्ये वेगवेगळी असतात. परस्पर संवाद, चर्चा आणि सामंजस्य याद्वारे हा दुरावा, अंतर नक्कीच कमी करता येईल.

जुन्या पिढीतील लोकांनी नवपिढीला परंपरागत, सामाजिक व धार्मिक विचारांचे महत्त्व पटवून द्यावे, परंतु नवपिढीवर ती बंधन म्हणून लादू नये. सातच्या आत घरात, ही पूर्वीची परंपरा. आज शिक्षण, नोकरी, व्यवसाय इ. च्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या नवीन पिढीला, हे कसं शक्य होईल?घरी परतायला रात्रीचे ९-१०वाजत असतील तर झोपायला १२ वाजणार, मग पहाटे लवकर उठणं कसं जमणार? आता वटपौर्णिमेला वडाची साग्रसंगीत पूजा आणि उपास केवळ परंपरा म्हणून केला पाहिजे, हे नवीन पिढी ऐकणार नाही. पण वटवृक्षाचं संगोपन, निसर्गाचा समतोल आणि आरोग्य या गोष्टींसाठी ते करावं, हे समजावून सांगितल्यावर आजच्या पिढीतील तरूण आणि तरूणी, दोघंही वृक्षारोपणाचा वसा उचलायला स्वतःहून पुढाकार घेत आहेत.  रोज देवपूजा करणं हा जुन्या पिढीच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग. पण नवीन पिढीला कदाचित तो वेळेचा अपव्यय वाटू शकतो किंवा त्यांच्या कामाच्या घाईगडबडीत त्यांना ते जमवता येत नसेल.  नवपिढी जर प्रामाणिकपणे त्यांचं काम करत असेल, त्यांना जमेल तसं सामाजिक उन्नतीसाठी शारीरिक, आर्थिक, बौद्धिक मदत करत असेल तर, जुन्या पिढीने हे समजून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यान, योगाभ्यासाची आवश्यकता संयतपणे तरूण पिढीला समजावून सांगितली पाहिजे.

आजच्या शिक्षणपद्धतीत जीवनमूल्यांचा अभाव जाणवतो. जीवघेण्या स्पर्धेच्या या युगात झापड लावल्यासारखी अवस्था आहे नवीन पिढीची! जुन्या पिढीतील लोकांनी नवपिढीला जुन्या जीवनमूल्यांचे महत्त्व आणि आजच्या परिस्थितीत त्यांची उपयुक्तता समजावून सांगणे आवश्यक आहे. कारण काळ कितीही बदलला तरी नेहमी खरे बोलणे, प्रामाणिकपणे वागणे, वडीलधाऱ्यांचा आदर आणि सेवा करणे ही शाश्वत मूल्ये कधीच कालबाह्य होत नसतात.

नव्यापिढीचे स्वैर वागणे, मुला-मुलींचे एकत्र फिरणे, रात्री उशिरा घरी परतणे, त्यांची कपड्यांची फॅशन, जुन्या पिढीला आवडत नाही.  जुनी पिढी, पालक अनेकदा या मुलांच्या आवश्यक गरजा पूर्ण करत नाही.  यातून मग वाद निर्माण होतो.  आपल्या वागण्याचं, गरजांचं योग्य समर्थन नवीन पिढीला करता आलं पाहिजे आणि आपल्या विरोधामागची भूमिका, जुन्या पिढीलाही नीट समजावून सांगता आली पाहिजे. अर्थात हे करताना दोन्ही बाजूंनी संयम राखणं खूप आवश्यक आहे. अन्यथा केस कापायला आई-वडिलांनी परवानगी दिली नाही म्हणून मुलीची आत्महत्या, मित्रांबरोबर पार्टी करायला पैसे दिले नाही, म्हणून वडिलांच्या खूनाचा प्रयत्न, मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून वडील आणि भावांनी तिला जीवे मारले, यांसारख्या घटना समाजात घडताना दिसतात.

नवीन पिढीला तंत्रज्ञानाची माहिती आपल्यापेक्षा जास्त आहे, हे वडीलधाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. घरबसल्या मोबाईलच्या मदतीने ते अनेक कामं, अगदी चुटकीसरशी पार पाडतात. मग ते लाईट बील भरणं, औषधं मागवणं, एखाद्या कार्यक्रमाची/प्रवासाची तिकिटे आरक्षित करणं असं काहीही असेल. पण यामुळे वेळ, पैसा आणि मनुष्यबळ यांची छान बचत होते. या पिढीच्या उधळपट्टीवर, अवास्तव खर्चावर टीका करणाऱ्या मंडळींनी हेही लक्षात घेतलं पाहिजे. दुसऱ्या शहरात अथवा परदेशात राहणारी अनेक मुलंही वेबकॅम सारख्या उपकरणांचा उपयोग करून आपल्या पालकांची काळजी घेताना दिसतात. त्यांच्या दैनंदिन गरजा आॅनलाईन व्यवहाराद्वारे पूर्ण करताना दिसतात.

 ‘आमच्या वेळी नव्हतं हो असं ‘, हे म्हणणारी पिढी कधीच मागे पडली आहे.  आत्ताचे पन्नाशीच्या आसपासचे आई-वडील अथवा सासू-सासरे बघितले, तर ते नवीन पिढीशी बरंच जुळवून घेताना दिसतात.  मुलांची कामाची वेळ, घरून काम, त्यांचं स्वातंत्र्य यांचा विचार करून, त्यांचं वेगळं राहाणं ते समजून घेतात. शक्य असेल तिथे पालक मुलांच्या लग्नाआधीच त्यांची वेगळं राहण्यासाठी सोयही करून ठेवतात. हे परिवार वेगळ्या घरात राहात असले तरी एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होतात आणि परस्परांना शक्य तेवढी मदतही करतात. आपल्या आचरणातून होणारे संस्कार पुढील पिढीत आपोआप झिरपत असतात. म्हणूनच परदेशात राहणारी अनेक मुलंही आपल्या परंपरा, मातृभाषा आवर्जून जपताना दिसतात.  कदाचित ते जपण्याची त्यांची पद्धत काळानुरूप थोडी वेगळी असेल.  पण हे चित्र नक्कीच आशादायक आहे.

  प्रत्येकाने आनंदात राहावे असे वाटत असेल, तर दोन्ही पिढ्यांनीआपल्या भूमिकेची अदलाबदल करून पाहावी. म्हणजे एकमेकांना समजून घेणं सोपं होईल. आपल्या बोलण्यातून, वागण्यातून एकमेकांबद्दल प्रेम, आदर, काळजी व्यक्त झाली पाहिजे. मानवी संवेदनशीलता हरवता कामा नये. दोन्ही पिढीतील सदस्यांनी वैचारिक भिन्नतेचा आदर राखला पाहिजे.

 सामाजिक संबंध सलोख्याचे ठेवण्यासाठीही एकमेकांस समजून घेणे आवश्यक आहे.

एकमेकांच्या भावना, विचारसरणी, सामाजिक मूल्ये समजून जीवन जगले पाहिजे. तेव्हाच दोन्ही पिढ्यांमध्ये समन्वय साधला जाईल.  शिक्षण, चौफेर वाचन, सामाजिक माध्यमांचा योग्य वापर यातून कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्यावर नक्कीच अनुकूल परिणाम दिसून येईल.  आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे अधिक संवेदनशीलतेने आणि सजगपणे बघण्याचा दृष्टीकोन जाणीवपूर्वक जोपासण्याचा प्रयत्न दोन्ही पिढ्या करत आहेत, ही समाधानाची बाब आहे.  शालेय शिक्षणात मूल्य शिक्षण आणि पर्यावरण विषयक जागरूकता यांचा समावेश हे त्यातील एक महत्वाचं पाऊल!याशिवाय अनेक सेवाभावी संस्था आणि गट वृक्षारोपण, रक्तदान, प्लास्टिक हटाव, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन, शैक्षणिक साहित्याचं वाटप, जुनं प्लास्टिक व मोबाईल सारखा ई-कचरा गोळा करून पुनर्वापरासाठी पाठवणे, असे उपक्रम राबवत आहेत.  या उपक्रमांमध्ये लहान-थोर सगळ्यांना सामील करून घेतलं जातं.  त्यामुळे दोन्ही – तिन्ही पिढ्यांमध्ये प्रत्यक्ष संपर्क, संवाद आणि आपुलकीचं नातं निर्माण होण्यास, खूप छान मदत होत आहे.  

 © सुश्री प्रणिता खंडकर

दि. १८/०७/२०२३

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “लोकसाहित्य-संशोधनात रमलेली विदुषी” – भाग – २  ☆ डॉ. वि. दा. वासमकर ☆

डॉ. वि. दा. वासमकर

?  विविधा ?

☆ “लोकसाहित्य-संशोधनात रमलेली विदुषी” – भाग – २  ☆ डॉ. वि. दा. वासमकर ☆

(विधीनाट्यांमध्ये पूर्वरंग आणि उत्तररंग असे दोन भाग असतात पूर्वरंग हा परंपरेनुसार धर्मविधीसाठी राखून ठेवलेला असतो त्यात ईश्वरविषयक किंवा तत्त्वज्ञानविषयक तात्विक व गंभीर विवेचनाचा भाग असतो. आणि उत्तररंगात तद्नुषंगिक आख्यानात लोकरंजन आलेले असते, असे त्या स्पष्ट करतात.) इथून पुढे —

‘लोककलांची आवाहकता’ या लेखामध्ये अलीकडच्या काळात मराठी रंगभूमी लोककलांचा आश्रय घेताना दिसते. असे त्या सुरुवातीलाच म्हणतात. ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकापासून दशावतार, गोंधळ, भारूड, जागरण अशा लोकनाट्यविधांचा उपयोग अनेक नवीन नाटकांनी केलेला आहे. याचे कारण सांगताना त्या म्हणतात, -“पश्चिमेचे अनुकरण हे एक कारण आहेच. पण केवळ पश्चिमेच्या एखाद्या नाटकाच्या अनुकरण करणे एवढ्याच एका प्रेरणेने मराठी नागर नाटकात लोकनाट्याचा प्रवेश झाला आहे काय?… आपले एकूणच आधुनिक जीवन हे दिवसेंदिवस तंत्रज्ञानाधीन होत चालले आहे. आधुनिक जीवनाचा निसर्गाशी आणि मातीशी असलेला संबंध तुटत चालला आहे. त्यामुळे भौतिक समृद्धी वाढत असतानाही एका पोकळीची जाणीव होत आहे. अशावेळी मानवी संस्कृती पुन्हा आपली मुळे शोधीत आहे… कलेच्या क्षेत्रातील या प्रेरणेचा आविष्कार पुन्हा नव्याने लोककलांचा शोध घेण्यातून होत आहे. कारण लोककलांमध्ये एक उत्स्फूर्तता असल्याने साक्षात जिवंतपणा असतो… जेथे जेथे समूहमनाशी नाते जोडण्याची तीव्रतेने गरज भासली, तेथे तेथे नागरकलांपेक्षा लोककला प्रभावी ठरलेल्या दिसतात. आजच ब्रेख्टमुळे नागर रंगभूमी लोककलांकडे वळली आहे असे नव्हे”. ताराबाईंच्या या भाष्यातून लोककलांचे महत्त्व आधोरेखित होते. ‘अदाची लावणी आणि नाट्यगीत’ हा आणखी एक महत्त्वाचा लेख या संग्रहात आहे. म्हणजे दरबारातील लावणी किंवा बैठकीची लावणी होय. अदा म्हणजे अभिनय. ही लावणी अभिनयप्रधान असते. तिच्यात अंगप्रत्यंगांचा लयबद्ध अविष्कार असतो. भावनांना चेतवणारे आविष्कार करणे हे या लावणीचे प्राणतत्त्व असते, असे प्रतिपादन करून प्रारंभीच्या सर्व शृंगाररसप्रधान नाट्य गीतांचे स्वरूप पाहिले, अभिनयरूप पाहिले तर बैठकीच्या अदाच्या लावणीचा हा नवा अवतार असल्याचे लक्षात येईल, असे त्या स्पष्ट करतात. अदा करणाऱ्या कलावतीची जागा स्त्रीपार्टी पुरुष नटाने घेतली पण शृंगारप्रधान नाट्यगीताचा आशय, सांगीतिक अविष्कारदृष्ट्या चाली आणि आंगिक अभिनय, मुद्राभिनय हा सर्वच आविष्कार एकसंधपणे पाहिला तर बैठकीच्या लावणीचे हे नवे रूप असल्याचे लक्षात येईल, असे मार्मिक अवलोकन त्या करतात.

तारा भवाळकर या जशा लोकसाहित्यमीमांसक आहेत, तशाच त्या स्त्रीवादी दृष्टिकोनातून विचार करणाऱ्या विचारवंतही आहेत. स्त्रीवादाच्या अनुषंगाने त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यातील एक म्हणजे ‘मायवाटेचा मागोवा’ हे पुस्तक. हे पुस्तक श्रीरामपूरच्या शब्दालय प्रकाशनने 1998 मध्ये प्रसिद्ध केले. या पुस्तकात दहा लेखांचा समावेश केला आहे. ‘लोक साहित्याचे पुनराकलन’ हा या संग्रहातील दुसरा लेख. हा लेख त्यांनी स्त्रीवादविषयक चर्चासत्रामध्ये वाचला होता. या लेखाच्या सुरुवातीला ताराबाईंनी स्त्रीवाद म्हणजे काय याचे स्पष्टीकरण दिले आहे. ते थोडक्यात असे -आधुनिक जीवनातील अनेक विचारधारांची निर्मिती पाश्चिमात्य जगतात झाली. आणि नंतर त्या जगभर पसरल्या. त्यातीलच एक म्हणजे स्त्रीवाद… स्त्रीकडे पाहण्याचा, तिला वागवण्याचा, तिच्याशी वागण्याचा दृष्टिकोन जगभर एकाच प्रकारचा आहे. आणि तो पुरुषांच्या तुलनेने गौणत्वाचा आहे. विषमतेचा आहे. स्त्री गौण आहे; पुरुषप्रधान आहे; ही भूमिका कुटुंब, समाज, धर्म, राज्य, अर्थ, संस्कृती आदी सर्व क्षेत्रात अनेक वर्षे नांदत आहे. आणि ही विषमता केवळ लिंगाधारित विषमता आहे… स्त्री-पुरुष विषमतेतून खरे तर विषमतेच्या जाणिवेतून, आधुनिक जगात स्त्री विषयक चळवळी सुरू झाल्या. यांतून संघर्षरत असलेल्या स्त्रीच्या जाणिवा अधिक विकसित झाल्यानंतर स्त्रीला स्वतःच्या स्थितीचा आणि म्हणूनच एकूणच मानवी समाजातल्या स्त्री-पुरुष नातेसंबंधाचा पुनर्विचार करण्याची तीव्र गरज भासू लागली… सृजनशील स्त्रीला आपले गौणत्व नेहमीच जाचत होते. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध तिने आवाज उठवायला सुरुवात केली आणि या चळवळीतून सिमॉन द बोव्ह या फ्रान्समधील स्त्रीच्या ‘द सेकंड सेक्स’ या ग्रंथाची निर्मिती झाली 1949 मध्ये प्रकाशित झालेल्या या ग्रंथाचा जगाच्या पाठीवरील सर्व प्रमुख भाषांमध्ये भाषांतर झाले. आणि यातून स्त्रीवादी चळवळीचा उदय झाला. आपल्याकडेही अनेक विचारवंत स्त्रिया या चळवळीशी निगडित झाल्या. त्यातील एक म्हणजे डॉ. तारा भवाळकर. ताराबाईंनी स्त्रियांच्या भावना त्यांच्या गीतातून, कथातून, किंवा म्हणी – उखाण्यातून कशा प्रकट झाल्या आहेत याचे चित्रण अनेक लेखांमध्ये केले आहे. ‘लोकसाहित्याचे पुनराकलन’ या लेखांमध्येही त्याचा प्रत्यय येतो. त्या लिहितात – 

देवा नारायणा माझी विनंती फार फार |

जन्म बायकांचा नको घालूस वारंवार ||

अशा स्त्री जन्माला नकार देणाऱ्या ओव्या स्त्रीगीतातून अक्षरशः शेकड्याने सापडतात, असे ताराबाई म्हणतात. त्या पुढे म्हणतात, “लोकगीतातून एरव्ही रामाचे कितीही कौतुक केले असले तरी त्याने गर्भवती सीतेचा परित्याग करणे स्त्री मनाला रुचलेलं नाही. तो लोकगीतातील स्त्री मनाला फार मोठी जखम करून गेलेला दिसतो.

सीता पतिव्रता नाही रामाला कळाली |

वनाच्या वाटेवरी चाके रथाची गळाली ||

असे म्हणून पुरुषसत्तेचा प्रतिनिधी असलेल्या रामाची अन्यायी वृत्ती चव्हाट्यावर मांडली आहे. ‘किती चतुर बायका’ हा लेखही स्त्रीवादी दृष्टिकोनातून लिहिला आहे. या लेखामध्ये शंकर-पार्वतीचा एक संवाद उद्धृत केला आहे. या संवादात शंकर आणि पार्वती एकमेकाला कोडी घालत असतात – ऐका हो शंकरा बोलाचा अर्थ करा असे पार्वतीने म्हटल्यावर संशयग्रस्त शंकर विचारतात – ऐकलं ग पार्वती बोलाचे अर्थ किती? कोणाला हात देत होतीस, कोणाला पाय देत होतीस, कोणाच्या मुखाकडे पाहून तू हसत होतीस या ओळींमध्ये शंकराने एका परीने पार्वतीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. यावर पार्वती मिश्किलपणे म्हणते- कासाराला हात देत होते, सोनाराला पाय देत होते, आरशाच्या मुखाकडे पाहून मी हसत होते हे उत्तर ऐकत राहताना पार्वतीच्या ओठाच्या कोपऱ्यात हसू दिसायला लागतं. हे उत्तर देणारी पार्वती नक्कीच चतुर आहे; असे ताराबाई म्हणतात.

 सारांश डॉ. तारा भवाळकर यांचे लोकसाहित्य संशोधन विचारात घेतले की, त्यांच्या चिकित्सक, मर्मग्राही दृष्टिकोनाचा सहज प्रत्यय येतो. त्यांच्या विपुल लेखनाचे सार थोडक्यात सांगायचे झाले तर त्या लोक संस्कृतीशी, स्त्रीच्या मानसिकतेशी अंत:करणापासून जोडल्या गेल्या आहेत.

– समाप्त –

लेखक : डॉ. वि. दा. वासमकर

सांगली (महाराष्ट्र)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “औडक चौडक ताराबाई” ☆ प्रा. अविनाश सप्रे ☆

प्रा. अविनाश सप्रे

?  विविधा ?

☆ “औडक चौडक ताराबाई☆ प्रा. अविनाश सप्रे ☆

ताराबाई भवाळकरांची मराठी महामंडळाने दिल्ली येथे भरणाऱ्या आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी केलेली निवड चतुरंग अन्वयसाठी या परिसरातील लेखक, कवींच्यासाठी आणि मुख्य म्हणजे समस्त सांगलीकरांसाठी आनंदाची आणि अभिमानाची घटना वाटणे साहजिकच म्हणता येईल, पण ही बातमी प्रस्तुत झाल्यानंतर बघता बघता समाज माध्यमातून, वृत्तपत्रातून, दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून, दूरध्वनीवरून आणि प्रत्यक्ष भेटून प्रचंड प्रमाणात बाईच्यावर जो अभिनंदनाचा वर्षाव झाला, तो अभूतपूर्व स्वरूपाचा होता. सर्वसाधारणपणे संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या नावांची चर्चा सुरू झाली आणि नंतर प्रत्यक्ष निवड झाली. वादविवाद होतात, उलटसुलट चर्चांना उधाण येते, निवडीमागच्या राजकारणाबद्दल बोलले जाते, खऱ्या खोट्या बातम्या पसरल्या किंवा पसरवल्या जातात, असा आजवरचा अनुभव, पण ताराबाईची निवड असे काहीही न होता झाली आणि तिचे सार्वत्रिक स्वागत झाले. एवढेच नव्हे तर ताराबाईची निवड या अगोदरच व्हायला हवी होती, अशीही प्रतिक्रिया उमटली. ताराबाईच्या ज्ञानसाधनेबद्दल आणि बौद्धिक कर्तृत्वाबद्दल वाटणारा आवर या निमित्ताने प्रकट झाला असे म्हणता येईल.

पुण्यातील शनिवार पेठेच्या सनातनी आणि पारंपारिक, कर्मठ वातावरणात आणि चित्रावशास्त्रीच्या वाड्यात बाईचे बालपण व्यतीत झाले. पुढे त्यांचे कुटुंब नाशिकला गेले आणि तिथे त्यांची वैचारिक जडणघडण होऊ लागली. इथे त्यांना कविवर्य कुसुमाग्रजांचा सहवास लाभला. याच काळात त्यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या मधुशाला या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचा मराठी अनुवाद केला. त्यानंतर नोकरी निमित्ताने सांगलीस आल्या आणि इथे त्यांचे वैचारिक आणि वाड्मयीन कर्तृत्व बहाला आली आणि नामवंत विदूषी म्हणून त्यांचा लौकिक झाला. पंचावन्न वर्षापेक्षा अधिक काळापासून बाईचे सांगलीमध्ये वास्तव्य आहे आणि सर्वत्र संचार करूनही सांगली हीच आपली कर्मभूमी आहे असे त्या अभिमानाने सांगतात.

लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि लोककला या बाईच्या विशेष आस्थेचा, अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय राहिला आहे महाराष्ट्रत, महाराष्ट्रबाहेर एकट्याने भ्रमंती करून बाईनी या विषयाचा वेध घेतला, साधनसामग्री गोळा केली, साहित्य गोळा केले, मौखिक संस्कृतीचे स्वरूप समजून घेतले. त्यांच्या आविष्कार पद्धती आणि शैलींचा विचार केला. त्याची चिकित्सा केली आणि या मौल्यवान लोकसंचिताला अभिजनांच्या विचार विश्वात महत्त्वाचे स्थान मिळवून दिले. बहुजनांचे लोकसाहित्य म्हटले की एकतर भाबड्या श्रद्धेने बघणे (बाई त्याला गहिवर संप्रदाय म्हणतात) किंवा उच्चभ्रू अभिजन त्याकडे अडाण्यांचे साहित्य समजून तुच्छतेने, उपेक्षेने पाहतो. ही दोन्ही टोके बाजूला सारून बाईनी या संस्कृतीकडे चिकित्सेने, डोळसपणे पाहिले, त्यातले हिणकस बाजूला करून सत्व शोधले आणि या विषयाकडे बघण्याची नवी दृष्टी दृष्टी दिली. ४० च्या वर बाईची ग्रंथसंपदा आहे आणि त्यातल्या ‘लोकपरंपरा आणि स्त्री प्रतिमा’, ‘यक्षगात आणि मराठी नाट्यपरंपरा’, ‘लोकजागर रंगभूमी’, ‘मिथक आणि नाटक’, ‘लोकसंचित’, मायवाटेचा मागोवा, मातीची रूपे, लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा, महामाया इत्यादी ग्रंथामधून त्यांनी लोकसाहित्य आणि संस्कृतीवर मूलभूत प्रकाश टाकला आहे. या ग्रंथांना लोकसाहित्याच्या अभ्यासात संदर्भ ग्रंथ म्हणून महत्त्वाचे स्थान आहे. मराठी विश्वकोशासाठीही त्यांनी या विषयावर लिहिलेल्या नोंदी आणि या विषयांचे केलेले सिद्धांतन महत्वाची मानले जाते.

नाटक आणि स्त्रीवाद हे बाईचे आणखी दोन अत्यंत जिव्हाळ्याचे विषय आहेत. ‘मराठी पौराणिक नाटकाची जडणघडण प्रारंभ ते १९२०’ या विषयावर त्यांनी पीएच. डी. केली आणि त्यांच्या प्रबंधाला पुणे विद्यापीठाचे सर्वोत्कृष्ट प्रबंधाचे सुवर्णपदक मिळाले अलीकडेच त्यांनी आद्य नाटककार विष्णुदास भावे यांचे चरित्र लिहिले. ‘मराठी नाटक नव्या दिशा, नवी वळणे’ हा त्यांचा नव्या नाटकांवरचा ग्रंथही प्रसिद्ध आहे. पुणे विद्यापीठाच्या ललित कला विभागात त्यांनी वेळोवेळी नाटकावर व्याख्याने दिली आहेत. सांगलीमध्ये तरुण व हौशी रंगकर्मीना घेऊन त्यांनी ए. डी. ए. ही नाट्य संस्था स्थापन केली आणि नवीन नाटके सादर केली. राज्य नाट्य स्पर्धेत सादर केलेल्या नाटकात त्यांनी स्वतः काम केले आणि त्यांना अभिनयाचे रौप्यपदकही मिळाले. मुळातच प्रखर आत्मभान असणाऱ्या बाईनी नव्याने आलेल्या ‘स्त्रीवादाचा’ पुरस्कार केला आणि स्त्रीमुक्ती चळवळीला सक्रिय पाठिंबा दिला. याच दृष्टीतून त्यांनी संत स्त्रियांच्या क्रांतिकारकत्वाची नव्याने ओळख करून दिली आणि लोकसाहित्याची स्त्रीवादी दृष्टीतून नवी मांडणी केली. अलीकडेच प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘सीतायन’ या पुस्तकातून त्यांचा हा दृष्टिकोन प्रखरपणे अधोरेखित झाला आहे.

औडक चौडक हा ताराबाईचा शब्द. त्याचा अर्थ ऐसपैस, आडवं तिडवं, वेडंवाकडं, आखीव रेखीव नसलेलं, स्वच्छंदी, मोजून मापून नसलेलं आपलं आजवरच जगणं आणि वाटचाल अशी आहे, असं त्यांना सुचवायचे असते, त्यामुळेच आपलं आयुष्य समृद्ध झालं असं त्या सांगतात. वयाची ८० पार करूनही त्या सदासतेज असतात या मागचं हे रहस्य आहे. बाई एकट्या राहतात, पण एकाकी नसतात. विचारांच्या संगतीत असतात, पुस्तकांच्या संगतीत असतात, लिहिण्याच्या संगतीत असतात, जोडलेल्या असंख्य लहान थोर, तरुण वृद्ध मित्र-मैत्रिणींच्या संगतीत असतात. जे घडले तेची पसंत अशा समाधानतेनं राहतात. अनेकांच्यासाठी आधारवड असतात.

प्रा. अविनाश सप्रे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “लोकसाहित्य-संशोधनात रमलेली विदुषी” – भाग – १  ☆ डॉ. वि. दा. वासमकर ☆

डॉ. वि. दा. वासमकर

?  विविधा ?

☆ “लोकसाहित्य-संशोधनात रमलेली विदुषी” – भाग – १  ☆ डॉ. वि. दा. वासमकर ☆

मराठीमध्ये लोकसाहित्य संशोधकांची एक मोठी परंपरा आहे. साने गुरुजी, डॉ. सरोजिनी बाबर, कमलाबाई देशपांडे, दुर्गा भागवत, ना. गो. नांदापूरकर, रा. चि. ढेरे, प्रभाकर मांडे, गं. ना. मोरजे, विश्वनाथ शिंदे इ. लोकसाहित्यमीमांसकांनी मराठी लोकसाहित्याच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. या लोकसाहित्यमीमांसकांमध्ये आपल्या वैशिष्ट्यपूर्ण लोकसाहित्य संशोधनाचे मौलिक योगदान देणाऱ्या ज्येष्ठ लेखिका आणि दिल्ली येथे होऊ घातलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांचा समावेश होतो.

डॉ. तारा भवाळकर ह्या मराठी विषयाच्या निष्णात प्राध्यापक असून; एक मर्मग्राही लोकसाहित्यसंशोधक म्हणून मराठी साहित्यविश्वाला परिचित आहेत. त्यांनी लोकसाहित्याचे संकलन आणि चिकित्सा तर केली आहेच; शिवाय नाट्य रंगभूमीवरील त्यांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे. लोकसाहित्य आणि रंगभूमीबरोबरच त्या स्त्रीवादी साहित्य चळवळीशी जोडल्या गेल्या आहेत. तसेच त्यांनी ललित आणि समीक्षणात्मक लेखनही केले आहे. या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब त्यांच्या विपुल लेखनात दिसून येते. हे लेखन पुढील काही ग्रंथांमध्ये समाविष्ट झाले आहे. ते ग्रंथ असे – ‘लोकसंचित’, ‘लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा’, ‘लोकसाहित्य : वाङ्मय प्रवाह’, ‘मायवाटेचा मागोवा’, ‘महामाया’, ‘लोकपरंपरा आणि स्त्रीप्रतिभा’, ‘लोकसाहित्यातील स्त्रीप्रतिमा’, ‘लोकपरंपरेतील सीता’, ‘यक्षगान आणि मराठी नाट्य परंपरा’, ‘लोकनागर रंगभूमी’, ‘मराठी नाटक : नव्या दिशा नवी वळणे’, ‘मराठी नाट्यपरंपरा : शोध आणि आस्वाद’, ‘मिथक आणि नाटक’, ‘तिसऱ्या बिंदूच्या शोधात’, ‘आकलन आणि आस्वाद’ ‘निरगाठ सुरगाठ’, ‘प्रियतमा’, ‘. मरणात खरोखर जग जगते’, ‘माझिये जातीचे’, ’बोरीबाभळी’, ‘स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर’, ‘स्नेहरंग’’, ‘मधुशाळा’ (हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाला’ या पुस्तकाचे मराठीतील पहिले भाषांतर) अशा विविध विषयांवरील सुमारे चाळीस ग्रंथ ताराबाईंच्या विपुल आणि मर्मग्राही लेखनाचे दर्शन घडवितात. ताराबाईंच्या या विपुल लेखनाचा विचार करणे या छोट्याशा लेखात शक्य नाही म्हणून त्यांच्या काही लोकसाहित्यविषयक ग्रंथांचा येथे थोडक्यात विचार करू.

‘लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा’ हा तारा भवाळकर यांचा ग्रंथ स्नेहवर्धन प्रकाशनने २००९मध्ये प्रकाशित केला. या ग्रंथात ताराबाईंनी लोकसाहित्याच्या अभ्यासाची तात्त्विक मांडणी करणारे अठरा लेख समाविष्ट केले आहेत. ‘लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा’ या पहिल्याच लेखात ताराबाईंनी लोकसाहित्य म्हणजे काय याची चर्चा केली आहे. Folklore या इंग्रजी शब्दाच्या आशयाची व्याप्ती त्यांनी सविस्तर स्पष्ट केली आहे. ‘लोकसाहित्य’ या सामासिक शब्दाची फोड करताना आणि त्याचा अर्थ स्पष्ट करताना ‘साहित्य’ हा शब्द ‘साधन’-वाचक आहे असे ताराबाई म्हणतात. आणि ‘लोक’ या शब्दाचा अर्थ त्या पुढीलप्रमाणे स्पष्ट करतात- “लोक म्हणजे केवळ ग्रामीण लोक नव्हेत की जुन्या काळातील लोक नव्हेत तर ‘लोकशाही’ या शब्दातील ‘लोक’ (people) या पदाला जवळचा असा आशय व्यक्त करणारा ‘लोक’ हा शब्द आहे” असे त्या म्हणतात. म्हणजेच सांस्कृतिकदृष्ट्या विशिष्ट मानसिक जडणघडणीचा समावेश ज्या समाजात किंवा ज्या समूहामध्ये आढळतो, असा मानवसमूह म्हणजे ‘लोक’! लोक हा शब्द नेहमीच समूहवाचक असतो. या अर्थाने लोकशाहीतील ‘लोक’ हा शब्दही समूहवाचक आहे असे त्यांचे मत आहे. लोकसाहित्याची अशी व्याख्या देऊन; ताराबाईंनी दुर्गा भागवत, दत्तो वामन पोतदार, हिंदीतील वासुदेव शरण अग्रवाल, पंडित कृष्णदेव उपाध्याय, रा. चि. ढेरे, यांच्या व्याख्या देऊन त्यांचा अर्थ स्पष्ट केला आहे. लोकसाहित्य या शब्दात लोकगीते, लोककथा, म्हणी, उखाणे, कोडी ही शाब्द लोकसाहित्याची अंगे आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. लोकसाहित्य ही प्रवाही घटना असते; अबोध समूह मनाच्या (collective unconscious) प्रेरणेतून लोकसाहित्य घडते, असेही त्या स्पष्ट करतात. भारतातील अनेक विद्यापीठातून लोकसाहित्याचे स्वतंत्र अभ्यासविभाग सुरू झालेले आहेत ही समाधानाची गोष्ट आहे, असे या लेखाच्या शेवटी त्या म्हणतात. लोकसाहित्याशी अन्य ज्ञानशाखांचा संबंध कसा येतो हे त्यांनी ‘लोकसाहित्य आणि ज्ञान शाखा’ हे शीर्षक असलेल्या तीन लेखांमधून स्पष्ट केले आहे. त्यामध्ये मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र व भाषाविज्ञान यांचे महत्त्वाचे योगदान असून; इतिहास, पुरातत्त्वशास्त्र आणि भूगोल यांचेही लोकसाहित्याशी जवळचे नाते असते असे त्या म्हणतात. लोकसाहित्याचे सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाशी घनिष्ठ नाते असते, असे त्यांचे प्रतिपादन आहे. कृषिनिष्ठ भारतीय जीवनातील सणवार व धर्मव्रते निसर्गसंबद्ध कसे आहेत हे त्या दाखवून देतात. लोकजीवनातील यात्रा उत्सवही निसर्गाशी संबद्धच असतात असे सांगून यात्रांमध्ये लोकसंस्कृतीच्या व लोकजीवनाच्या अनेक पैलूंचा अविष्कार होतो; देवतांविषयीचा आदर व्यक्त होतो. बहुरूपी, गोंधळी, भुत्ये, वासुदेव असे अनेक लोक कलावंत यात्रा जत्रात आपल्या कलेचे प्रदर्शन करतात लोक जीवनातील या सर्व अविष्कारालाच बहुदा धर्म हे नाव दिले जाते. नागपंचमीची नागपूजा, बैलपोळ्याला बैलाची पूजा, मंगळागौरीची पूजा, नवान्नपौर्णिमा, गौरी-गणपतीची पूजा, आणि वटसावित्रीची पूजा इत्यादी पूजा व्रते हे सगळे धर्म म्हणून ओळखले जातात मात ताराबाईंच्या मते हे सर्व लोकधर्मच आहेत आणि या लोकसंस्कृतीमध्ये धर्माचे रूप निसर्ग धर्माचे आहे असे त्या म्हणतात. या लोक धर्मामध्ये मोक्षाची मागणी नसते तर ऐहिक जीवनाविषयीच्याच मागणी करणारे हे लोकधर्म असतात. असे त्या प्रतिपादन करतात. ताराबाईंच्या या विवेचनातून प्रस्थापित धर्मापेक्षा लोकधर्माला महत्त्व दिलेले दिसून येते. ‘नाट्यात्मक लोकाविष्कारांची काही उदाहरणे’ या लेखामध्ये वारकरी, नारदीय, आणि रामदासी संप्रदायांच्या कीर्तनपद्धतीचा व विवाह विधींचा ताराबाईंनी परामर्श घेतला आहे. अशा रीतीने लोकसाहित्यविषयक तात्त्विक भूमिका मांडल्यानंतर या ग्रंथाच्या शेवटी साने गुरुजींच्या लोकसाहित्याच्या संकलनविषयक कार्याची ताराबाईंनी ओळख करून दिली आहे.

‘लोकसंचित’ हा ताराबाईंचा आणखी एक महत्त्वाचा लोकसाहित्यविषयक ग्रंथ. पुण्याच्या राजहंस प्रकाशनने हा ग्रंथ डिसेंबर 1989 मध्ये प्रकाशित केला. या ग्रंथात वीस लेख समाविष्ट झाले आहेत. या ग्रंथातही सुरुवातीला लोकसाहित्यविषयक तात्त्विक भूमिका आली आहे. ‘लोकनाट्यातील धार्मिकता आणि लौकिकता’ या पहिल्याच लेखात ‘लोकनाट्य’ ही संकल्पना स्पष्ट करताना तमाशा, खंडोबाचे जागरण, गोंधळ, कोकणातले नमन, दशावतारी खेळ यांचा विचार करून हे सर्व एकाच गटात बसणार नाहीत असे त्या म्हणतात तमाशा हा प्रकार प्रयोगविधांपेक्षा भिन्न आहे आणि आजच्या तमाशात धार्मिकतेचा अंश इतका पुसट झाला आहे की तो शोधूनच काढावा लागतो, असे त्या म्हणतात. मात्र दशावतारी खेळ, खंडोबाचे जागरण, गोंधळ इत्यादी विधिनाट्यांमधून धार्मिकतेचा प्रत्यय येतो असे त्या सूचित करतात. कारण या विधीनाट्यांमध्ये पूर्वरंग आणि उत्तररंग असे दोन भाग असतात पूर्वरंग हा परंपरेनुसार धर्मविधीसाठी राखून ठेवलेला असतो त्यात ईश्वरविषयक किंवा तत्त्वज्ञानविषयक तात्विक व गंभीर विवेचनाचा भाग असतो. आणि उत्तररंगात तद्नुषंगिक आख्यानात लोकरंजन आलेले असते, असे त्या स्पष्ट करतात.

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : डॉ. वि. दा. वासमकर

सांगली (महाराष्ट्र)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ताराबाई नावाचं लोकगारूड… ☆ श्री महेश कराडकर ☆

श्री महेश कराडकर

?  विविधा ?

☆ ताराबाई नावाचं लोकगारूड… ☆ श्री महेश कराडकर ☆

कपाळावर भलं मोठं कुंकू. रेखीव चेहरा. त्यावर पेरलेलं एक मार्दवशील, कणखरपणाची झाक असलेलं आणि सौम्य असं हसू. आवाज हळुवार पण भाषा ठाम. संवाद म्हणजे एकाच वेळी समोरच्यांशी आणि त्यांनी जाणिवेने अभ्यासलेल्या जोपासलेल्या लोकसंस्कृतीच्या संदर्भांशी चाललेलं ऐकतच राहावं असं हितगुज. अनेक विचार प्रवाह, चळवळी, मत-मतांतरं यामध्ये भांबावून गेलेल्या आजच्या आमच्या पिढीला कुठलाही अट्टाहास न करता विवेकवाद पेरणार सांगणं. त्यांच्या साधेपणात, त्यांच्या व्यासंगात, त्यांच्या ठामपणात, त्यांच्या सहवासात भेटणार्‍या प्रत्येकाला एक वेगळीच अनुभूती येते. हजारो वर्षं सोसत आलेल्या स्त्रीमनाचं सुसंस्कृत, तितकच पुरोगामी आणि प्रगल्भ अशा विचारांचं अलौकिक शिल्पच जिवंत झाल्याची ती अनुभूती असते. त्यातही दुधात साखर मिसळावी तशी सर्वांच्या हृदयात आपलं आईपण जिव्हाळ्यानं नोंदवणारी आपुलकीही असते.

… बाईंबद्दल असा विचार करायची फुरसत कधीच मिळाली नाही. जशी आपल्याला आईबद्दल विचार करायला सवड नसते, तशी! इतका जवळचा त्यांचा सहवास त्यांच्या शेजारी म्हणजे एक घर पलीकडेच राहत असल्याने मला गेली ३५-४० वर्ष मिळालाय… आणि माझ्या इतकाच तो साहित्य, नाटक, लोककला, शिक्षण, प्रबोधन अशा अनेक क्षेत्रात चळवळेपणानं काम करत असलेल्या आजूबाजूच्याच नव्हे, तर कोसो योजने दूर असणाऱ्या अनेक सृजनशील स्नेहीजनांनाही त्यांनी जाणीवा जपत दिला आहे.

मराठी मुलखातूनच नव्हे तर राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवरून सांगलीत येणारी अशी ही मंडळी पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनाला एखाद्या वारकऱ्यांनं ज्या श्रद्धा भावनेनं जावं; त्या आचेनंच नाट्यपंढरी, सहकारपंढरी, संगीतपंढरी, आरोग्यपंढरी अशा अनेक नामाभिदानांनी सालंकृत झालेल्या सांगली मिरजेत आली, की डॉ. तारा भवाळकरांना भेटायला हमखास येतात. अशी माणसे कधी सांगून येतात. तर कधी अगंतुकपणे येतात. तेव्हा त्यांची ओळख करून देण्यासाठी… त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी बाईंचा हमखास,

‘लगेच ये!’, म्हणून मला आणि माझ्या पत्नीला आशाला एक घर पलीकडून फोन येतो. आणि आपलं गणगोत भेटल्याचा पुनःप्रत्यय आपलेपणानं समृद्ध करून जातो.

लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती यांचा आयुष्यभर मागोवा घेत आलेल्या बाईंच्या साहित्य क्षेत्रातील अनमोल कामगिरीची दखल आजवर अनेक संस्थांनी घेतली आहे. मात्र त्यांना अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळावं असं गेली अनेक वर्ष मराठी साहित्यप्रेमींना आवर्जून वाटत आलेलं आहे.

परवा मराठी भाषेचं आणि तिच्या भाषाभगिनींचं विश्व व्यापणाऱ्या; कर्मयोगाने सांगलीच्या, जन्मानं नाशिकच्या आणि बालपण व किशोरवयातील वास्तव्याने काही काळासाठी पुण्याच्या असलेल्या ताराबाईंना ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं. आणि अवघं मराठमोळं जग हरखून गेले. गेला आठवडाभर त्यांचा मोबाईल, घरातला फोन शुभेच्छांचा फुलगंध घेऊन आनंद आणि उत्साहाने अविरतपणे खणखणतो आहे. साहित्य-संस्कृतीच्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी आणि कार्यकर्त्यांबरोबरच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री, विधानसभेच्या अध्यक्षा, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, विविध क्षेत्रातील संघटना व संस्थांतील माणसांची त्यांच्या छोट्याशा निवासस्थानी रीघ लागलेली आहे.

सतत गजबजलेल्या डॉ. आंबेडकर रोडवरच्या ताराबाईंच्या घरासमोर २५-३० छोट्यामोठ्या व्यावसायिकांच्या दुकानांची एक रांग आहे. या व्यावसायिक मित्रांना देखील ताराबाई अखिल भारतीय संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या या गोष्टीचा आनंद झाला. या साध्यासुध्या माणसांनीदेखील त्यांना भेटून त्यांचं अभिनंदन केलं. हे मराठी भाषेवरचं त्यांचं प्रेम खरंतर मराठीला अभिजाततेचा दर्जा देण्याइतकंच मोलाचं नाही काय?

 

© श्री महेश कराडकर

मो. ९४२३०३६००७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लोक यात्री – तारा भवाळकर… ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

लोक यात्री – तारा भवाळकर ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

यावत् जीवेत् तावत् शिक्षेत |

या वचनाला खरा अर्थ देणाऱ्या, तारा भवाळकर, मराठीतील ख्यातनाम लेखिका!लोकसाहित्यापासून नाट्यशास्त्रापर्यंतचा सेतुवेधक संदर्भकोश, मार्क्सवाद ते गांधीवाद यांच्या सूक्ष्म अभ्यासक, भारतीय संस्कृती पासून आधुनिक स्त्रीवादी चळवळीच्या नामवंत अभ्यासक, मराठीच्या ख्यातनाम प्राध्यापिका, कसदार वक्त्या अशी त्यांची विविध अंगी ओळख महाराष्ट्राला आहे.

तारा भवाळकर यांना स्त्री रचित लोकसाहित्यात करुणेने वेदनेत आयुष्य कंठणारी स्त्री दिसली तर जात्यावरच्या ओव्यातून विद्रोह करणारी, स्पष्ट मत मांडणारी स्त्री दिसली. त्या अभ्यासातून त्यांनी एक कार्यक्रम ‘एक ओवी, एक कथा, एक प्रथा ‘ असा सादर केला आहे. ही तेरा भागांची मालिका यू ट्यूब वर उपलब्ध आहे. त्यांच्या ओघवत्या शैलीत त्या आपल्याला एक ओवी सांगतात आणि मग त्या ओवीमागे एक कथा असते ती सांगतात. त्या कथेच्या अनुषंगाने कोणत्या प्रथा निर्माण झाल्या असतील त्यांचेही त्या अंदाज बांधतात. त्यामुळे कोणत्या मानसिकतेतून ती ओवी रचली गेली असेल याचेही रसभरीत वर्णन ऐकायला मिळते. त्या म्हणतात “ओवी ही पोटातून येते कारण ते सुखदुःखाचे गाणे असते. ओवी हे शुद्ध काव्य आहे. ते कधी रूपकाच्या माध्यमातून तर कधी इतर माध्यमातून येते. विद्रोही ओव्या, बंडखोर ओव्या यांच्या बरोबर सामान्य स्त्रीच्या ओव्यात घरच्यांचे, सगळ्या नात्यांचे कौतुक असते, श्रमाची प्रतिष्ठा असते, माहेरच्या आठवणी असतात. ” या कथांमधून, ओव्यांमधून समाजशास्त्र, मानव वंश शास्त्र, संस्कृतीकरण व काळानुसार संस्कृतीत होणारे बदल या सगळ्याचा अभ्यास करण्याची त्यांची पद्धत आपल्यालाही विचार प्रवृत्त करणारी आहे.

त्यापैकी काही ओव्या व त्यांच्या कथा व प्रथा यांचा उहापोह करण्याचा माझा हा अल्पसा प्रयत्न आहे.

कारंडे यल्लुबई एका पुरुषाची करी नारी

तुझे सत्व मला दाव, माझं संकट तुझ्यावरी

स्त्री प्रधान संस्कृतीत देवतांचे प्रस्थ असल्यामुळे त्यांची देवळे होती. पण शेजारी पुरुष सहचर नव्हता. देवीची उपासना करायची असेल तर पुरुषाला स्त्री रूप घेऊन यावे लागे. यातूनच पोतराजाची प्रथा सुरू झाली. त्या देवता पुरुष देवांचा उपयोग फक्त अपत्य प्राप्ती पुरताच करून घेत. यातून निर्माण झालेली प्रथा म्हणजेच श्री तिरुपती कडून दर वर्षी कोल्हापूरच्या अंबाबाईला साडी येणे. अर्थात हळू हळू जशी पुरुष प्रधान संस्कृती निर्माण झाली तसे प्रथांमध्ये सुद्धा बदल होत गेले.

जन्मामाजी जन्म केळी बाईचा चांगला

भरतारावाचून गर्भ नारीला राहिला

किंवा

श्रेष्ठ पतिव्रता केळी बाई म्हणू तुला

विना भोग गर्भ मरणाचा ग सोहळा

यामध्ये एक विरोबाची कथा आहे, ज्याचीआई सुरवंता वारुळतून जन्माला आली. तिने शंकराची आराधना करून पुरूषाविना विरोबा या पुत्राला जन्म दिला. यातूनच कालांतराने पतिव्रता या प्रथेचा जन्म झाला. पुरुष अनेक स्त्रियांशी संबंध ठेवू शकतो पण स्त्री मात्र अगदी विधवा झाली तरी दुसऱ्या पुरुषाचा विचार सुध्दा मनात आणू शकत नाही. याची कथा म्हणजे रेणुकेची कथा आहे. यक्ष युगुलाच्या जलक्रीडा पाहून तिचे मन विचलित झाले. त्याची शिक्षा म्हणून परशुरामांनी तिचा शिरच्छेद केला. नंतर तिला जमदग्नी ऋषिनी पुन्हा जिवंत केले पण मातंगिणीचे शिर देऊन. त्यामुळे रेणुका मातंगिण देवता झाली. यातूनच देवाच्या नावाने वेश्या व्यवसाय करणाऱ्या सुमंगलांचा जन्म झाला. मग ही,

घरची अस्तुरी जसा कर्दळीचा गाभा

पराया नारीसाठी चोर गल्लीमध्ये उभा

ओवी जन्माला आली.

रुक्मिणी रुसली गेली दिंडिर बनाला

अबीर बुक्क्याची गर्दी तिला सोसना

किंवा

दळता दळता म्हाळसा दमली, म्हणून देवाने बाणाईला आणली

किंवा

 रुसली रुक्मिणी, ती कां दिंडीर बना गेली

राधा – कृष्णाच्या मांडीवर तिने मंदिर देखली

 अशा विठ्ठलाशी संबंधित ओव्या आहेत. देवाने कितीही स्त्रियांना आसरा दिला तरी त्याचं देवत्व कमी होणार नाही याची काळजी घेणाऱ्या गोष्टी आहेत. त्यातली एक वृंदेची. ही विवाहित असूनही देव तिचा स्विकार करतो. पण लोकांनी केलेल्या आरोपांमुळे तिने धरणीचा आश्रय घेतला. ते पाहून देव धावले, तिला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात तिचे फक्त केस हातात आले. हीच तुळस, देवाला प्रिय असणारी. त्यामुळे वारकरी डोक्यावर तुळस घेऊन विठ्ठला कडे जातात. तसेच तुळशीचे

लग्न देवाशी लावतात. या प्रथा निर्माण झाल्या. विठ्ठलाच्या कपाळावर पिंड आहे, त्यामुळे तो शैवांचा देव आहे, तो विष्णूचा अवतार मानला गेला त्यामुळे वैष्णवांचा ही आहे. असे हरिहर विठ्ठलामध्ये आहेत.

अशा अनेक ओव्या, कथा व प्रथा आपल्याला या तेरा भागांमध्ये ऐकायला मिळतात. गोष्ट सांगणे ही सुध्दा एक कला आहे. ती तारा भवाळकर यांना चांगली अवगत आहे. गोष्ट सांगताना त्या त्यातले बारकावे सांगतात. अशा प्रथा का पडल्या, याचे विवेचन ही करतात. संस्कृतीत कसे बदल होत गेले, स्त्री प्रधान संस्कृती मधून पुरुष प्रधान संस्कृती कशी जन्माला आली, हे ही जाताजाता स्पष्ट करतात. ओघवती भाषा, प्रत्येक गोष्टीला दाखले देण्याची सवय, गोष्ट ज्या काळातील आहे, त्या काळाचे, परिसराचे, सामाजिक परिस्थितीचे, स्त्रियांच्या भूमिकेचे स्पष्टीकरण यामुळे प्रत्येक भाग श्रवणीय झाला आहे.

बघा, तुम्हीही ऐका. ज्ञान व मनोरंजन दोन्हींचा मिलाफ असणारा मेवा आहे.

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नवं वर्ष -नवी स्वप्नं ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

?  विविधा ?

☆ नवं वर्ष -नवी स्वप्नं ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

— वा-यानं फडफडणार कॅलेंडर वार शांत होताच जरा स्थिरावल.डिसेबर २०२४

नजरेला पडल.मनांत आलं.. बघतां बघतां वर्ष सरलं कि.!

कुणा जवळच्याला निरोप द्यावा तसं मनं खंतावलं.

डोळेही ओलावले.

खरं तर कॅलेंडरच शेवटचं पानं म्हणजे नेहमीच नवीन वर्षाच्या चाहुलीचं.!

तसा नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईचा जल्लोष सुरू झाला आहे.त्यादिवसाचे बेत उत्साहाने ठरवून झाले आहेत.

आता नवं वर्षाचे नविन कॅलेंडर भिंतीवर लागेल.तसंही

जुन्याच्या जागी नवीन येत असतंच. !. एका कॅलेंडरच जाणं आणि नव्या कॅलेंडरच येणं एवढाच,याचा सहज सोपा अन् मर्यादित अर्थ आहे का? या कॅलेंडरच्या पानांवर असलेल्या प्रत्येक तारखेसोबत,आपली गती, कार्यक्रमाच्या नोंदी जोडलेल्या आहेत.मागील वर्षाला निरोप देतांना हेही लक्षांत येत अगदीं ठरवलेल्या काही गोष्टी करायच्याच राहून गेल्यात. प्रगतीचे-समाधानाचे ,आनंदाचे जे हवेसे क्षणं मिळाले त्या बरोबरच मनं अस्वस्थ, उद्विग्न करणारे ,डोळ्यांत पाणी येणारे नकोसे क्षणंही आज आपल्या बरोबर आहेत.यातील नकोशा क्षणांच जगतांना झालेलं ओझं मागे ठेवून, आपल्याला हवं ते शुभंकर असं बरोबर घेऊयात. २४ सालचं कॅलेंडर पुन्हा एकदा चाळतांना प्रत्येक तारीख, दिवस यातून स्वतःच स्वतःला वाचूयात.रोजचं जगणं , स्पर्धा, परीक्षा यातून प्रत्येक पानाबरोबर वाटचाल करतांना,धांवतांना मुठीतली कांही स्वप्नं घरंगळून गेली असतील.तर ती, या नवीन वर्षात एक एक गोळा करुयात.काहीवेळा अगदी अनपेक्षितपणे आपलं स्वत:च असं जग,जगणं नव्या वळणावर येऊं लागलंय याचा अनुभव येतो.अशावेळी मनं असंख्य प्रश्नांत भिरभिरत असेल तर प्रश्नांचा पसारा आवरुन सकारात्मकतेने त्याकडे पाहूयात.तसेच आपल्या व समोरच्या कडून कळत न कळत झालेल्या चुका ‘ साॅरी ‘ या शब्दाने दुरावा नाहिसा करतात,याचा
प्रत्यय घेऊयात.जुन्या बरोबर नवी नाती निर्माण करुयात.

ज्यांच्यामुळे आपलं जगणं आत्तापर्यंत वळणदार, समाधानी,सुखावह झालं, त्यांच्या बद्दल वयाचा विचार नकरता कृतज्ञता व्यक्त करुयात. मनांत येत.. आता नवीन कॅलेंडर भिंतीवर लागेल अन् पहिल्या पानावरचा पहिला दिवस हा नुसता उगवणार नाही तर प्रत्येकाच्या मनांतील नव्या स्वप्नांना जागवेल. नव्या संकल्पांसाठी, नव्या उर्मीला साद देईल.!

नव्या वर्षातल पहिलं पाऊलं नव्याचा आरंभ करतांना पहिल्या दिवसालाच चिकटून राहणार नाही याची काळजी घेऊयात.मागील वर्षातील ताणे-बाणे, कडवटपणा, सारं विसरून आनंद, समाधान देत-घेत नवीन वर्षाच स्वागत करुयात. मानसिक, शारीरिक आरोग्यपूर्ण जीवन, समाधान.

यासाठी सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐

©  शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ व्रतोपासना – ५. तळपत्या सूर्याची निंदा करु नये ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

व्रतोपासना – ५. तळपत्या सूर्याची निंदा करु नये ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

उन्हाळा सुरु झाला की मला काही मंडळी आवर्जून आठवतात. त्यांना जणू सूर्य म्हणजे आपला शत्रू वाटतो. आणि कोणत्याही वेळी बाहेर पडले तरी ही मंडळी काय हा सूर्य,किती ते उन अशी सतत तक्रार करत असतात. याला बऱ्याच प्रमाणात मीडिया पण जबाबदार आहे. त्यांच्या प्रॉडक्टच्या जाहिराती मनावर फार परिणाम करतात.

त्या विरुद्ध काही मंडळी सूर्योपासना करतात. त्या विषयी फार आदर वाटतो.

उन्हाळा सुरु झाला की, आपण सहज म्हणतो, ‘ काय हा उन्हाळा. केव्हा संपणार? ‘ पण हा सूर्य तळपलाच नाही तर पुढे पावसाळा कसा येणार? आणि धनधान्य कसे पिकणार? आणि हा सूर्य प्रकाश सगळ्याच जीवसृष्टी साठी आवश्यक असतो. कित्येक कामे सूर्यावर अवलंबून असतात. आपली दिनचर्या जरी घड्याळावर अवलंबून असेल तरी इतर सृष्टी साठी मात्र सूर्य आवश्यक असतो. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा सूर्य आवश्यक आहे. त्याच्या शिवाय आपण दिवसाची कल्पना सुद्धा करू शकत नाही. आपल्याला आवश्यक आणि महत्वाचे व्हिटॅमिन डी आपल्याला सूर्य प्रकाशात सहज व मोफत मिळते. पृथ्वीवर ज्या भागात काही महिने सूर्य उगवत नाही त्यांना सूर्याचे दर्शन,त्याची उब खूप महत्वाची वाटते.

सूर्याचे अनन्य साधारण महत्व आहे आणि ते सर्वांना माहिती आहे.  ज्या वेळी सूर्य जास्त प्रखर असेल त्यावेळी आपण आपले विविध उपयांनी संरक्षण करु शकतो. त्या साठी सूर्याला नावे ठेवणे योग्य नाही. आपण मोठी माणसे जसे वागतो,बोलतो त्याचेच अनुकरण लहान मुले करतात. आपण जर त्यांना सूर्याचे महत्व सांगितले तर त्यांना आपण चांगली दृष्टी, चांगले विचार देऊ शकतो. आपण ज्या निसर्ग देवता मानतो त्यांचे पूजन करतो त्यात सूर्याचे स्थान खूप महत्वाचे आहे. म्हणून  सूर्याची कधीही निंदा करू नये.

हे व्रत म्हणून आपण नक्कीच आचरणात आणू शकतो.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ १६ डिसेंबर… विजय दिवस ! ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

१६ डिसेंबर… विजय दिवस ! ☆ सौ कल्याणी केळकर बापट

काही सण, समारंभ, उत्सव, सोहळे असे असतात की जे आपण कधीही विसरू शकत नाही. त्या दिवसांच आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असतं. त्या दिवसांमध्ये आपल्या स्वतःच्या वैयक्तिक घटनांचा समावेश असतो आणि ज्या आपल्या मातृभूमीवर आपण मनापासून प्रेम करतो तिच्यासंदर्भातील महत्वाच्या घटनांच्या दिवसाचा पण त्यात समावेश असतो.

आपल्या भारताच्या इतिहासात काही दिवस असे आहेत की जे प्रत्येक भारतीयाने समजून घेतले पाहिजे किंवा त्या बद्दल माहिती ठेवली पाहिजे. कारण त्या दिवसांचा आत्ताच्या पिढीवर तसेच आजच्या वर्तमानावर प्रभाव जाणवून येतो. त्यातलाच एक हा “विजय दिवस’. 16 डिसेंबर ! भारत आणि पाकीस्तान देशांमध्ये ज्या ज्या लढाया झाल्या त्या मध्ये एक महत्वपूर्ण लढाई म्हणजे १९७१ ची. त्या युद्धा नंतरच भारताने पाकीस्तानला हरवून बांगलादेश या नव्या देशाला जन्माला घातलं. सर्वात कमी झालेली मनुष्य हानी हे १९७१ च्या युद्धाचं एक वैशिष्ट्यं. अर्थात त्या मागे असलेले सैन्याचे अप्रतिम नियोजन व तो निर्णय घेण्याची तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हिम्मत.

इंदिरा गांधी किवा पंडित नेहरू, महात्मा गांधी यांच्याकडे बहुतांश लोक खूप एका बाजूने बघतात असे मला वाटते.

कोणताही मनुष्य असो तो त्याच्या आयुष्यात काही निर्णय बरोबर घेतो तर काही चूक. पण खास गोष्ट अशी चूक निर्णय घेतांना ते चूक निर्णय आहे हे तेव्हा कोणाच्याच लक्षात येत नाही. तसचं या महान लोकांच्या बाबतीत झालं.

पण राजकीय विचार जरा बाजूला ठेवले आणि १९७१ च्या युद्धाचा नीट अभ्यास केला तर या मागे इंदिरा गांधी याची निर्णय क्षमता आणि नियोजन करण्याची पद्धत या बद्दल कौतुक नक्की वाटेल. या युद्धाच्या यशामागे तत्कालीन सैन्यप्रमुख जनरल सँम मानेकशॉ यांचा प्रंचड मोठा हात व इंदिरा गांधीची साथ होती. तेव्हाच्या पश्चिम पाकीस्तानने पूर्व पाकीस्तानवर केलेले प्रचंड अत्याचार व त्यातून हजारो बंगाली लोकांचे भारतात स्थलांतर यामुळे भारत पण या युद्धात ओढल्या गेला.

पण घाई घाई मध्ये चुकीचे निर्णय न घेता, थोडा काळ थांबून व शांत नियोजन करून अवघ्या १६ दिवसात पाकीस्तानला आपण आत्मसमर्पण करायला भाग पाडलं. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर हे सर्वात मोठे आत्मसमर्पण ठरले. आज सुद्धा तो फोटो एक मोठ्या इतिहासाची साक्ष व ख-या अर्थाने आयकाँनिक समजल्या जातो. ज्या मध्ये भारताकडून ले. ज. जगजीत सिंग अरोडा व पाकीस्तान कडून ज. नियाझी यांनी आत्मसमर्पणाच्या करारावर स्वाक्ष-या केल्या व तो दिवस होतां १६ डिसेंबर.

म्हणून हा दिवस आपण” विजय दिवस” म्हणून साजरा करतो. आजच्या पिढीला त्या दिवसाचे महत्व जेवढं कळायला हवं तेवढं कदाचित कळतं नसेलही. पण अभ्यासाने कळलं की त्या दिवसानंतर खूप गोष्टी बदलल्या हे पण खरं. जसं एक नवा कोरा देश जन्माला आला, पाकीस्तान ची ताकद कमी झाली. भारत सुध्दा आंतरराष्ट्रीय राजकारणात सक्रीय भाग घेऊन निर्णय तडीस नेऊ शकतो हे संपूर्ण जगाने पाहिले. तेव्हा भारत एवढा श्रीमंत नसतांनाही स्थलांतरीत लोकांना काही काळ ठेऊन घेऊन, स्विकारुन दयाळू मानवतेचं दर्शन संपूर्ण जगासमोर चित्रीत झालं. युद्धाच्या आधी रशिया सोबत मैत्री करार करून आपला आंतरराष्ट्रीय दबदबा भारताने वाढवला. १९७१ च्या युद्धात जे युद्ध कैदी होते त्यांना काही काळानंतर सुखरूप पाकीस्तानात सोडून देण्यात आले. त्यात सुध्दा भारताचा मानवतावादी दृष्टीकोन संपूर्ण जगाला दिसला. त्या युध्याच्या विजयानंतर मा. इंदिरा गांधीच्या प्रसिद्धीला मात्र सीमाच नव्हती. एक स्त्री पंतप्रधान असा अचंबित करणारा निर्णय घेऊ शकते हेच मुळात भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीला पचणारी गोष्ट नव्हती. पण इंदिरा गांधीनी हे करून दाखवलं.

आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताला नेहमी पिछाडीचा किंवा एक गरीब देश असंच हिणवल्या जायचं. ह्या घटनेनंतर मात्र हे चित्र हळू हळू बदललं व त्या नंतर झालेल्या अणुस्फोट चाचणीने तर संपूर्ण जगाचे डोळे उघडल्या गेले.

मी जसे आधी बोलले की एक व्यक्ती आपल्या आयुष्यात काही चुकीचे निर्णय घेते तर काही बरोबर, पण आपण एक समंजस नागरिक म्हणून नेहमी चुकीच्या निर्णयाबद्दल बोलण्या पेक्षा कधी आपलं मन मोठ करून चांगल्या गोष्टी केल्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत. म्हणून इंदिरा गांधी व तत्कालीन सैन्याला “विजय दिवस” हा अभूतपूर्ण दिवस आमच्या सारख्या सामान्य जनतेला दाखवल्यामुळे मनापासून सलाम आणि धन्यवाद.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गीता जशी समजली तशी… भाग – २ ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

 

☆ गीता जशी समजली तशी… भाग – २ ☆ सौ शालिनी जोशी

गीतेचा पहिला श्लोक आणि शेवटचा श्लोक यांची संगती 

गीता हा चार पात्रांमधील संवाद ! धृतराष्ट्र, संजय, अर्जुन, आणि श्रीकृष्ण. गीतेची सुरुवात धृतराष्ट्राच्या प्रश्नाने आणि शेवट संजय याच्या उत्तराने. त्यामुळे यातील संगतीचा विचार महत्त्वाचा ठरतो.

धृतराष्ट्र बहि:चक्षुनी आंधळा आहेच पण, पुत्र प्रेमामुळे अंत:चक्षुनेही अंध आहे. त्याला युद्धाचे वर्णन सांगणार संजय हा धृतराष्ट्राचा एकनिष्ठ सेवक व सारथी. त्याला व्यासांनी दिव्यदृष्टी दिली होती. तो व्यासांचा शिष्य होता. राजमहालात आपल्या स्वामींच्या पायाशी बसून रणांगणावरील युद्धाचे वर्णन सांगण्यासाठी त्याची योजना. अर्जुन पंडूपुत्र श्रेष्ठ धनुर्धर आणि श्रीकृष्ण त्याच्या रथाचा सारथी तसेच अर्जुनाचा मित्र, सखा, बंधू, प्रत्यक्ष परमात्मा.

गीतेचा पहिला श्लोक म्हणजे धृतराष्ट्राने संजयाला विचारलेला प्रश्न. धृतराष्ट्र उवाच,

“धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव:l

मामका: पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जयll” (१/१)

हे संजया, धर्मक्षेत्र अशा कुरुक्षेत्रावर युद्धाच्या इच्छेने एकत्र आलेल्या माझ्या व पंडूच्या पुत्रांनी काय केले? गीतेत हा एकमेव श्लोक धृतराष्ट्राच्या तोंडी आहे. आणि तो त्याचा स्वभाव, इच्छा व्यक्त करायला पुरेसा आहे. पुत्रप्रेमात गुंतलेला धृतराष्ट्र त्यांच्या जयाची वार्ता ऐकायला उत्सुक आहे. भिष्म, द्रोण, कर्ण दुर्योधनाच्या बाजूला आणि सैन्यही पांडवांच्या सैन्यापेक्षा दीडपट. त्यामुळे कौरवच युद्ध जिंकणार असे वाटत आहे. ‘ मामका:’ हा शब्दच आपल्या मुलांचे प्रेम आणि पंडूचे मुलगे असा परकेपणा निर्माण करतात. हे युद्ध होणारच. पण निर्णय ऐकायला तो उत्सुक आहे. बाहेरून शांत पण अंतस्थ तणावग्रस्त असे व्यक्तिमत्व.

गीतेत पुढे संजयाने केलेले युद्धाच्या तयारीचे वर्णन, अर्जुनाला झालेला मोह, त्याचा युद्ध न करण्याचा निश्चय, कृष्णाने त्याचे केलेले मतपरिवर्तन, त्यासाठी सांगितलेले तीन योग, स्वधर्माची- स्वकर्माची जाणीव, आत्म्याचे अविनाशित्व इत्यादी उपदेशाने अर्जुनाचा मोह दूर होऊन त्याचे युद्ध करायला तयार होणे हे विषय येतात. हे सर्व तत्त्वज्ञान ऐकून संजयाला आत्मिक आनंद मिळाला होता. धृतराष्ट्राच्या पहिल्या प्रश्नाला उत्तर देण्याची जबाबदारी संजय याची. युद्धभूमीवर पांडवांचा जय होणार याची खात्री संजयाला आहे. पण तसे सांगितले तर आपल्या स्वामींना रुचणार नाही आणि खोटे बोलावे तर आपल्या मनाला पटणार नाही. म्हणून मोठे खुबीदार उत्तर मोठ्या चतुर्याने, आडपडद्याने संजय देतो. प्रत्यक्ष तोंडाने कौरवांचा पराजय होईल असे न सांगता,

” यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर :l

तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्ममll ” (१८/७८)

जेथे योगेश्वर श्रीकृष्ण आणि धनुर्धर पार्थ तेथे श्री, विजय, भूती आणि निती असे माझे निश्चित मत आहे. प्रत्यक्ष युद्ध घडायच्या आधीच आपले मत सांगून संजय मोकळा झाला. एक सर्वत्र, सर्व काळी योग्य असे सत्य त्याने सांगितले. श्रीकृष्ण स्वतः योगेश्वर सर्व योग जाणणारे आणि तसा मार्ग दाखवणारे, तत्त्वज्ञानी, सर्वज्ञ आणि त्यांना साथ पार्थ म्हणजे ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणारा, धनुर्धारी अर्जुन. म्हणजेच बुद्धीला ज्यावेळी पराक्रमाची जोड मिळते तेव्हाच विजय आणि वैभव प्राप्त होते. जे दुर्योधनाकडे नव्हते. त्यामुळे अर्जुन म्हणजे त्याचा भाऊ युधिष्ठिर जिंकणार आणि त्याला सर्व वैभव प्राप्त होणार. असे आपले ठाम मत सांगण्याचे धैर्य संजयला प्राप्त झाले, ते श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेले बोधामृत ऐकून. अशा प्रकारे पहिल्या आणि शेवटच्या श्लोकाची संगती. म्हणून गीता ही संजयाच्या भावाने ऐकण्यासाठी, अर्जुनाच्या भूमिकेतून आचरण्यासाठी आणि श्रीकृष्ण बनण्याचा प्रयत्न करण्यासाठी आणि आंधळ पुत्र प्रेम नसावं हे दाखवण्यासाठी आहे. श्रीकृष्ण म्हणजे तत्वज्ञान आणि अर्जुन म्हणजे कर्म यांची सांगड आहे.

हे युद्ध एकाच कुटुंबातील दोन भावांच्या मुलांमध्ये, दोन वृत्तीं मधील आहे. आसूरी आणि दैवी. तेव्हा असुरी वृत्ती कडून दैवी वृत्तीकडे वाटचाल करणे महत्त्वाचे. आपल्यामध्येही दोन्ही प्रकारचे गुण असतात. शरीराच्या रणांगणावर लढाईसाठी एकत्र आलेले. तेव्हा अंत:करणातील श्रीकृष्णाचे स्मरण करून अर्जुन रूपाने साधना करावी आणि दुर्गुणांवरती विजय मिळवावा.

गीतेची सुरुवात ‘धर्म’ या शब्दाने आणि शेवट ‘मम’ या शब्दाने म्हणून ‘धर्ममम ‘ म्हणजे माझा धर्म. म्हणजेच स्वधर्म- स्वकर्तव्य सांगणारी गीता. त्याचे आचरण हेच गीतेचे सार. अशा आचरणाने कुरुक्षेत्राचे धर्मक्षेत्र करता येते. कुरु म्हणजे कर आणि क्षेत्र म्हणजे शरीर. धर्माधिष्ठित विहित कार्याला शरीर लावणे म्हणजेच कुरुक्षेत्राचे धर्मक्षेत्र करणे. पलायनवाद सोडून समर्थपणे प्रसंगाला तोंड द्यायला शिकवणे हेच गीतेचे वैशिष्ट्य. दुर्गुणावर सद्गुणांचा हा विजय. त्यासाठी गरज बुद्धीची आणि साधनेची मग सुखच सुख. हे जाणणे हीच गीतेच्या पहिल्या व शेवटच्या श्लोकाची संगती.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares