मराठी साहित्य – विविधा ☆ शिक्षक दिनानिमीत्त्त – “एस्.राधाकृष्णन्…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ शिक्षक दिनानिमीत्त्त – “एस्.राधाकृष्णन्…” ☆ सौ राधिका भांडारकर 

डॉ. राधाकृष्णन् हे एक महान, विद्वान व्यक्तीमत्व! शालेय जीवनात,५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करत असतानाच या महान व्यक्तीमत्वाची, शैक्षणिक पुरस्कर्ता, शिक्षकांचे समाजातील योगदान मौल्यवान मानणारे म्हणून ओळख झाली. प्रचंड आदराची भावना त्यावेळीही होती आणि आजही प्रत्येक भारतीयांच्या मनात ती  आहेच.

डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म ५सप्टेंबर १८८८ रोजी .

तामीळनाडूत तिरुमणी या छोट्याशा ,गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला.त्यांचे वडील,सर्वपल्ली विरस्वामी हे गरीब असले तरी विद्वान होते. आपल्या मुलानेही पंडीत व्हावे ही त्यांची इच्छा होती.

डॉ राधाकृष्णन हे अतिशय हुशार विद्यार्थी होते.आयुष्यभर त्यांनी शिक्षणक्षेत्रातल्या अनेक शिष्यवृत्त्या प्राप्त केल्या.

१९०६ मध्ये त्यांनी तत्वज्ञान (philosophy) या विषयात एम ए केले. आणि त्यांची मद्रास रेसीडेन्सी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. पुढे ,लंडन  आॉक्सफर्ड विद्यापीठात भारतीय तत्वज्ञानाचे शिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती.बनारस विद्यापीठाचे कुलगुरु असताना, त्यांनी तत्वज्ञानावर अनेक पुस्तके  लिहीली.

डाॅ. राधाकृष्णन् विवेकानंद आणि वीर सावरकर यांना आपले आदर्श मानतात. लेख आणि भाषणाद्वारे त्यांनी भारतीय तत्वज्ञान संपूर्ण जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. बहुआयामी व्यक्तीमत्व होते त्यांचे. भारतीय प्रतिभा आणि संस्कृतीवर त्यांचे प्रेम होते.

१९४७ साली देश स्वतंत्र झाला. पंडीत नेहरु पंतप्रधान झाले. त्यावेळी नेहरूंनी त्यांना ,सोव्हीएत युनीअन बरोबर खास राजदूत म्हणून मुत्सद्देपणाची कामगिरी करण्यासाठी आवाहन केले.अशा रितीने ते राजकारणात आले. स्वातत्र्यानंतर दहा  वर्षांनी आपल्या देशाच्या घटनेत उपराष्ट्रपतीचे पद नेमले गेले. आणि भारताचे पहिले ऊपराष्ट्रपती म्हणून त्यांची नेमणूक झाली.

 १९५८ साली भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. १९६२ ते १९६७ दरम्यान त्यांनी भारताचे दुसरे  राष्ट्रपती म्हणून हे पद भूषविले.

या दरम्यान भारतीय राजकारणात बरेच चढऊतार झाले. दोन पंतप्रधानांच्या मृत्युसमवेत भारत चीनच्या भयंकर युद्धातल्या पराभवाचा सामना त्यांना कणखरपणे करावा लागला.

जर्मन ऑर्डर पौल ले मेरीट फाॅर आर्ट्स अँड सायन्स पुरस्कार,शांतता पुरस्कार, ब्रिटीश ऑर्डर ऑफ मेरीट अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले. ब्रिटीश सरकारने त्यांना सर ही पदवी बहाल केली.

शिक्षण आणि शांततेसाठी मिळणार्‍या नोबेल पारितोषिकासाठी त्यांना १६वेळा नामांकित केले गेले.

विद्यार्थ्यांमध्ये ते अतिशय लोकप्रिय होते.पाच सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिन.तो वैशिष्ट्यपूर्ण साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे परवानगी मागितली. डॉ. राधाकृष्णन यांना शिक्षकांविषयी खूप आदर होता.नव्या पीढीचे शिल्पकार म्हणून ते त्यांना मान देत.म्हणून राधाकृष्णन यांनी त्यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करावा असे विद्यार्थ्यांना सुचवले. आणि तेव्हांपासून शाळांमधून ५ सप्टेंबर हा शिक्षकदिन म्हणून धूमधामपणे साजरा होतो. या दिवशी विद्यार्थीच शिक्षकाची भूमिका पार पाडतात.

१९६७ साली डॉ. राधाकृष्णन निवृत्त झाले आणि मद्रासला येउन स्थायिक झाले.

वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचे शिवकामु या त्यांच्या नात्यातल्या मुलीशी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना पाच मुलगे आणि एक मुलगी होती. मात्र त्यांच्या पत्नीचे अकाली निधन झाल्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन विस्कटले.

अखेरच्या दिवसात त्यांना गंभीर आजाराचा सामना करावा लागला. १७एप्रील १९७५ साली वयाच्या ८६व्या वर्षी ते अनंतात विलीन झाले.

भारतीयांसाठी अत्यंत भूषणीय  बहुआयामी व्यक्तीत्व!

।। झाले बहु होतील बहु आहेत बहु। परि यासम हाच।।

त्यांना त्यांच्या जयंती निमीत्त ही आदरांजली वाहूया..

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “प्रेमा तुझा रंग….?” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

🌸 विविधा 🌸

☆ “प्रेमा तुझा रंग…?” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

प्रेमाचे प्रकार अनेक.  प्रत्येक प्रकाराचे रंगही अनेक.  आयुष्यात प्रेमाची सुरुवात ही मातृप्रेमाने होते. त्यानंतर पितृप्रेम. त्यानंतर भ्रातृ व भगिनी प्रेम.  अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर प्रेमाच्या विविध प्रकारांची आपल्याशी गाठ पडते.

प्रेमा तुझा रंग कसा हे नाव प्रा. वसंत कानेटकर यांच्या एका सुंदर नाटकाचे. प्रेमाच्या अर्थात मी वर्णन केलेल्या प्रेम प्रकारां व्यतिरिक्त, स्त्री-पुरुषांच्या तारुण्यापासून निर्माण झालेल्या प्रेमाच्या विविध रंगांच्या छटा त्यामध्ये खूप सुंदर तऱ्हेने दाखवल्या आहेत.  प्रेम हे  विरोधाभासातूनही निर्माण होऊ शकते. आयुष्यात प्रेमाची जपणूक करताना  विविध प्रकारे अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते.

आपण याच प्रकारच्या प्रेमाबाबत विचार करूया.

प्रेमाचे विविध रंग, त्याच्या विविध छटा आपणाला लहानपणापासूनच  श्रीकृष्णाच्या चरित्रफ्रसंगातूनच ओळख देऊन जातात. राधा, रुक्मिणी, सत्यभामा, द्रौपदी, मीरा ! 

किती वेगवेगळे रंग!

राधा, मनामनांच्या एकरुपतेमधून शारिरीक ही म्हणता येणार नाही आणि अशारिरीकही म्हणता येणार नाही असे अनोखे प्रेम. मानसिक एकतानता, त्यातून निर्माण झालेले अद्वैत व अद्भुत प्रेमरंग. या प्रेमाला काय नाव द्यावे हे कुणाला समजणारच नाही किंवा कोणतेही नावच देता येणार नाही.  पण एक अनोखी सुंदर आणि भावनिक रंगछटा या प्रेमातून व्यक्त होत असते. भावुकतेची उधळण भावनांची जपणूक या सर्वातून निर्माण झालेल्या या विविध रंग छटा!  श्रीकृष्णाच्या बालपणीच्या या अगम्य अद्भुत प्रेमलीलांना कृष्णचरित्रात एक अक्षय अढळ स्थान प्राप्त झाले आहे.

प्रथमदर्शना पासूनच समर्पण भावनेतून निर्माण झालेले अलौकिक प्रेम.  प्रथम दर्शनानंतर दुसऱ्या कोणाचाच विचार मनात येऊ शकणार नाही एवढे उत्कट प्रेम !  ही एक अद्भुत रंगछटा रुक्मिणीच्या प्रेमातून दिसते.

प्रेम आणि क्रोध हे एकमेकांच्या विरोधी आहेत का पूरक आहेत याचा संभ्रम पडावा कृतककोपापासून ते क्रोधागाराच्या भितीपलीकडे घेऊन जाणारे, पण प्रेमच!  सत्यभामेच्या या प्रेमाला काय नाव द्यावे ?  एक अनोखा रंग हे चरित्र उधळून जाते.

एखाद्या स्त्रीला भगिनी मानून एक उच्च कोटीचा भगिनी प्रेमाचा उदात्त अनुभव देणारा, कृष्ण द्रौपदीच्या अद्वितीय प्रेमाचा एक अभिनव रंग !

मीरेचे भक्तिमय पण कालातीत असे प्रेम ! शारिरीक आकर्षणापलीकडचे स्वप्निल भावनेतून निर्माण झालेले अगम्य, अनाकलनीय असे भक्तीरसपूर्ण पण कालमर्यादांना भेदणारे प्रेम !

एका श्रीकृष्णाच्या चरित्रातच स्त्री-पुरुष प्रेमाच्या किती विविध रंगछटा पहावयास मिळतात हे एक अद्भुतच.

आपल्याला असे वाटेल की अशा रंगांचे प्रेम अलीकडे कुठे बघायला मिळेल ? एकाच व्यक्तीच्या जीवनात  एवढ्या विविध प्रेम रंगांची उतरण सापडणे अवघड आहे.  परंतु विविध व्यक्तींच्या जीवनात यापैकी काही रंगांची उधळण अवश्य दिसून येईल.

पाहताक्षणी प्रेम ही माझ्या तरुणपणात मला भाकड कथा वाटत असे.  परंतु माझाच एक अत्यंत जवळचा मित्र त्याच्या आयुष्यात हे घडले, प्रत्यक्ष ! त्याला मी साक्षीदार आहे.  त्यांचे लग्नही झाले. पळून जाऊन नाही.  आई-वडिलांच्या संमतीने रीतसर.  पन्नास वर्षाचा संसारही झाला.  त्या अत्यंत उत्कट आणि सुंदर प्रेमाशी माझा परिचय ही झाला.

अमृता प्रीतम यांचे चरित्र वाचताना एका आगळ्यावेगळ्या आणि उत्कट प्रेमाचा एक नवीन अनुभव वाचायला मिळाला. अमृता व साहिर लुधियानवी.  हा त्यांच्या चरित्रातील एक उतारा वाचा

‘अमृता लाहोरला होत्या तेंव्हा साहिर त्यांना भेटायला त्यांच्या घरी यायचे. घरी आले की या दोघांच्या मनसोक्त गप्पा व्हायच्या. गप्पा मारता मारता साहीर सिगारेटी फस्त करत राहायचे. अमृता मात्र साहिरनी सोडलेल्या धुम्रवलयात आपली स्वप्ने पाहायच्या. साहिर तिथून गेल्यावर त्यांनी पिऊन टाकलेल्या सिगारेटची थोटके त्या गोळा करायच्या, अन हळूहळू त्यांना पुन्हा शिलगावून ओठी लावायच्या ! त्या आपल्या ओठांवर साहिरना अनुभवायच्या ! या नादात अमृतांना सिगारेटचे व्यसन जडले. अमृता साहिरला कधीच विसरू शकल्या नाहीत.’

त्यांचे हे प्रेम शारीरिक पातळीवर कधीच गेले नाही.  हा किती अनोखा प्रेमरंग!  अशा तऱ्हेचे उत्कट प्रेम कधी ऐकले नव्हते. बहुधा असे प्रेम हे फक्त अमृता प्रीतम यांचे  एकमेवाद्वितीयच.

त्यांचे संपूर्ण चरित्र हे विविध प्रेमांचा एक अद्वितीय आणि अतिंद्रीय अनुभव देऊन जाते.

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि गोपाळराव जोशी यांचे विरोधाभासात्मक प्रेम. चिडचिडेपणा,  क्रोध, धाक ही प्रेमाची अंगे असू शकतात ? परंतु यातून ही  एक विरोधाभासात्मक प्रेमाचे उदाहरण आपणाला दिसते. त्यांच्या चरित्रातून आपल्याला जाणवते.  प्रेमाच्या विरोधी अर्थातून प्रेमाचे विविध पैलू आणि प्रेमरंग आपल्याला  अनुभवायला मिळतात.

भगिनी निवेदिता यांच्या चरित्रातून आपणाला भगिनी प्रेमाचे एक अलौकिक दर्शन घडते.  साता समुद्रा पार असलेली एक मुलगी एका अनोख्या देशात येते. एका तेजस्वी वाणीने आणि समृद्ध ज्ञानाने प्रभावित होऊन एका परधर्माच्या धर्मकार्यात स्वतःला झोकून देते.  स्वामी विवेकानंदांची ही मानस भगिनीं, त्यांच्या कार्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करते. हे अद्भुत भगिनी प्रेम एकमेवाद्वितीयच.

बाबा आमटे आणि साधनाताई यांचे प्रेम ही सुद्धा मला नतमस्तक करणारी भावोत्कट प्रेमाची कहाणी, साधनाताईंच्या चरित्रात आपल्याला वाचायला मिळते.  बाबांच्या कार्यात आपले आयुष्य झोकून देणाऱ्या परंतु वेळप्रसंगी बाबांच्या वैचारिक भूमिकेला विरोधही करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमाची आपणास ओळख होते. बाबा नास्तिक तर साधनाताई देवपूजक. बाबांनी साधनाताईंना त्यांच्या देवधर्मासाठी विरोध केला नाही, पण सहकार्य ही केले नाही. कुष्ठरोग्यांची लग्ने लावण्याबाबत बाबांचा विरोध मोडून काढून साधनाताईंनी त्यांच्या आयुष्यात विविध रंग भरले. प्रेमाच्या समर्पणातून सुद्धा स्वतःचे वेगळे व्यक्तिमत्व घडवता येते आणि प्रेमातून फुलवता येते हा प्रेमाचा कुठला रंग म्हणावा ?

या सगळ्या प्रेमाच्या रंगांची उधळण पहात असताना वेगवेगळ्या रंगछटांचे एक इंद्रधनुष्य आपण पाहत असतो या सगळ्या पार्श्वभूमीवर अलीकडे या रंगांतून आयुष्य फुलवण्याला नवी पिढी पारखी होत आहे काय, असे वाटू लागते. या सर्व प्रेमाच्या रंगावरून समर्पणाच्या भावनेतूनही स्वतःचे स्वतंत्र व्यक्तिमत्व घडवता येते हे वारंवार सिद्ध होत असते,  समर्पणाची भावना नसली तरी किमान समन्वयाची भावना ठेवून  तडजोडीने आपले आयुष्य रंगीत करता येते याची जाणीव नवीन पिढीतील अनेकांना का असू नये ?

या सर्व प्रेम रंगातून आणखीही एक रंग त्याबाबत जास्त विवेचन न करता व नामोल्लेख न करता त्या प्रेमाचा उल्लेख करावासा वाटतो.  सामाजिक नीती मूल्यांना तडा देत, स्वतःच्या जीवनात प्रेम रंगाची उधळण करणारी काही उदाहरणे आहेत. समाजाने त्यांना बदनाम केले असेल, बहिष्कृतही केले असेल किंवा त्यांची निंदानालस्ती ही केली असेल.  त्यांचे बद्दल अनेक गैरसमज  पसरवले असतील. त्यांच्याशी समाज फटकूनही वाढला असेल. परंतु त्यांनी स्वतःचे आयुष्य त्यागाने प्रेमाने आणि समन्वयाने वेगळ्या तऱ्हेने रंगीत बनवले.  परंतु हे रंग त्यांच्या आयुष्यापुरतेच मर्यादित राहिले.  समाजात मात्र त्यांच्या प्रेम रंगांची एक ग्रे शेड ज्याला म्हणतो तो फक्त एक पारवा रंगच दिसून आला आहे.  हा सुद्धा एक प्रेमाचा रंगच नव्हे काय ?

व्यक्ती स्वातंत्र्याचा हट्टाग्रह न धरता समन्वयाने आणि एकमेकांना पूरक भूमिका घेत भले भांडण होत असेल, भले अबोला होत असेल, भले चिडचिड होत असेल, काहीही असो.  परंतु प्रेमाच्या भावनेने एकमेकांना धरून ठेवण्यातच रंगांची उधळण होत असते हे नवीन पिढीतील मुलांना समजावून सांगण्याची खरोखरच गरज आहे असे वाटते. त्यासाठी मी एक विशेष मंगलाष्टक बनवले होते.  सावधानता ही लग्नातच अधोरेखित का केली जाते हे समजले पाहिजे.

शुभमंगल सावधान…

शुभमंगल जरी आज होतसे, जीवनी सावधचित्त असावे

शुभमंगल या दिनी म्हणूनी, सारे म्हणती सावधान,

शुभमंगल सावधान………

 

मुखी कुणाच्या वह्नी येता, दुज्या मुखाने पाणी व्हावे

मी मी तू तू कुणी बोलता, दुज्या मुखाने मौनी व्हावे

एक मुखाने मौनी होता, दुज्या मुखाने प्रेमी व्हावे

दिनी आजच्या शुभमंगल पण, जीवनी सावधचित्त असावे

शुभमंगल जरी आज होतसे, जीवनी सावधचित्त असावे

शुभमंगल या दिनी म्हणूनी, सारे म्हणती सावधान,

शुभमंगल सावधान………

कुणी कुणाला काय बोलले,

भांडण मिटता विसरुन जावे

मोठ्यांचे कटुबोल कोणते,

मनात कधीही नच ठेवावे

मनास होता जखम कोणती,

प्रेम दुज्याचे औषध व्हावे

दिनी आजच्या शुभमंगल पण, जीवनभर ते प्रेम जपावे

शुभमंगल जरी आज होतसे,

जीवनी सावधचित्त असावे

शुभमंगल या दिनी म्हणूनी,

सारे म्हणती सावधान,

शुभमंगल सावधान………

एका क्षणी भाळलात तरीही, जीवनभर तुम्ही सांभाळावे

क्षण एक पुरे तो तुटण्यासाठी, जीवनभर जे जुळवून घ्यावे

म्हणून सांभाळावे क्षण क्षण,

कायम सावधचित्त असावे

आज भरून घ्या आशिर्वचने,

जीवन सारे मंगल व्हावे

शुभमंगल जरी आज होतसे,

जीवनी सावधचित्त असावे

शुभमंगल या दिनी म्हणूनी,

सारे म्हणती सावधान,

शुभमंगल सावधान………

सहजीवनाच्या सुरुवातीलाच पुढे येणाऱ्या अनेक अडचणीच्या प्रसंगी समन्वयाची भूमिका घेऊन आयुष्य प्रेममय केल्यास रंगांची उधळण होत राहील. अर्थात हे सर्व तात्विक विवेचन ही वाटेल परंतु आमच्या पिढीच्या सर्वसामान्यांच्या जीवनातही विविध अडचणीचे संघर्षाचे प्रसंग येऊनही आज आमचे सहजीवन यशस्वी झाले असे लोक म्हणतात. परंतु प्रत्यक्ष जीवनाचा अनुभव घेताना काय घडत होते हे सुद्धा माझ्या एका कवितेत सांगितले आहे.

हे आम्हा सर्वसाधारण सामान्यांचे प्रेमाचे रंग.

काय म्हणावे याला

त्याला आणि तिला

जीवन असह्य होत गेले

पण सहन करत राहिले

त्यालाच जग प्रेम म्हणत राहिले

तो आणि ती

भांड भांड भांडले

थोबाडावे वाटले

पण मन आवरत राहिले

त्यालाच जग प्रेम म्हणत राहिले

त्याला आणि तिला

वेगळे व्हावे वाटले

घटस्फोट घेण्यासाठी

वकील नाही गाठले

त्यालाच जग प्रेम म्हणत राहिले

त्याला आणि तिला

नको संसार वाटले

लेक सून मुलगा जावई

सारे गोत जमले

त्यालाच जग प्रेम म्हणत राहिले

चव्वेचाळीस वर्षे

आमचे तसेच घडले

आम्हालाही तेच मग

प्रेम म्हणावे वाटले

यशस्वी संसार जग म्हणत राहिले

एकटे नको जगणे

असे आता वाटते

तुझ्या आधी मीं

असे व्हावे वाटते

वेगळे काय यात जग म्हणत राहिले

कुणास ठाऊक याला

प्रेम म्हणतात का

आय लव्ह यू

कधीच नाही म्हटले

किती प्रेमळ जोडपे जग म्हणत राहिले

©  श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रक्षाबंधन- बदलणारे स्वरूप… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

रक्षाबंधन – बदलणारे स्वरूप… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

भावना त्याच पण माझ्या नजरेला त्याचे बदलणारे स्वरूप जाणवले.

बालपणीचे रक्षाबंधन म्हणजे मज्जा!महत्वाचे म्हणजे शाळेला सुट्टी.नारळाचे पदार्थ खाणे.घरी येणारे आणि लाड करणारे मामा.आणि मामा घरी आल्यावर आमच्या खोड्यांना उधाण!एक दिवस मोठ्यांच्या शिस्तीतून सुटका.

हळूहळू या सणाचे महत्व लक्षात येऊ लागले.पण त्यातील गंमत होतीच.पण वय वाढले तसा एक वेगळाच जाच सुरु झाला.आणि राखी पौर्णिमा नावाचा निबंध रुपी त्रास उभा राहिला.बरं माझी गंमत अशी व्हायची की मला वाटायचे जसा सण साजरा केला तसे लिहायचे.आणि फजिती व्हायची.एकंदरीतच साहित्य,कल्पना विस्तार,रसग्रहण यातील माझी बालबुद्धी काही मोठी झाली नाही. त्यामुळे संदर्भा सहित स्पष्टीकरण या बाबत पहिल्या पासून मी सलाईन वरच असते.तर ज्यांच्या निबंधाला शाबासकी मिळायची ते जग जिंकल्याच्या आनंदात असायचे.आणि यांनी निबंधात लिहिलेले केव्हा घडले,किंवा यांनी हा सण असा कधी साजरा केला याचा विचार मी करत रहायची.मग एका मैत्रिणीने सांगितले त्यात कल्पना असतात.माहिती असते.काही गाण्याच्या ओळी असतात.मग तो निबंध छान होतो.हे समजले आणि माझा निबंध म्हणजे समालोचन आहे हे समजले.

जसे जसे वय मोठे होत गेले तसे सणाची तयारी.त्यातील अडचणी लक्षात येऊ लागल्या.आणि विविध वाचन,मिळणारी माहिती यातून रक्षाबंधन याचा अर्थ कळू लागला.

अजून एक बाल मनाला पडलेला प्रश्न असा होता की इतकी सुंदर राखी असते मग त्याला बंधन का म्हणायचे?आणि दुसऱ्यावर असे बंधन का टाकायचे?मग त्यात आनंद कसा?आणि भाऊ लहान असेल तर तो बहिणीचे रक्षण कसे करणार? ज्यांना भाऊच नाही त्यांचे काय?

मग वाचनातून, मोठ्या माणसांकडून याची उत्तरे मिळाली..

ते मायेचे,प्रेमाचे बंधन आहे.कोणतीही गोष्ट थोड्या बंधनात असेल तर ती योग्य वाटेने जाते आणि आनंद देते.जसे नदीला काठ,बांध गरजेचे असतात नाहीतर ती विध्वंस करेल.शाळेतील विद्यार्थ्यांना पण शालेय बंधने आवश्यक असतात.वाद्यांवर पण काही बंधने,ताण असेल तरच ती सुरात वाजतात.

या सणातून दोन व्यक्तींमध्ये एक नाते निर्माण होते.असलेले दृढ होते.आणि आपण एकमेकांच्या वेळेला उपयोगी पडायचे आहे याची जाणीव टिकून राहते.जरी हा सण बहीण भाऊ यांचा मानत असले तरी रक्षणकर्ता कोणीही असू शकते.तिथे नाते,वय  असा भेदभाव नसतोच.एक मानसिक आधार असतो.

आम्ही आमच्या शाळांमध्ये हा मोठ्या उत्साहात साजरा करतो.त्यामुळे शाळेतील मुलांमध्ये न कळत संस्कार होतात.सैनिक हॉस्पिटल मध्ये जाऊन तेथील सैनिकांना राखी बांधतो.त्या मुळे आपले खरे रक्षक त्यांना समजतात. आणि शाळेतील झाडांना पण मुले राखी बांधतात.त्या मुळे निसर्ग आपला सोबती,रक्षक आहे व आपण त्याचे जतन,रक्षण केले पाहिजे ही भावना वाढीस लागते. बहुतेक सगळे देवाला राखी बांधतात.आम्ही बहिणी एकमेकींना राखी बांधतो.

तर माझ्या दृष्टीने मज्जा ते व्यापक जबाबदारी, भावना अशी अनेक रुपे रक्षाबंधन याची समोर आलेली आणि अनुभवलेली आहेत.

न बदललेली मात्र एकच गोष्ट अनुभवली आहे,ती म्हणजे आकाशवाणी वर लागणारी हिंदी,मराठी गाणी तेथील गाणी लावणारे बदलले किंवा गायक निवर्तले आहेत.पण प्रसारित होणारी गाणी मात्र त्रिकालाबाधित आहेत.

असे हे बंधन मनापासून स्वीकारु या.आणि कोणाचा तरी मानसिक आधार बनू या.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

३१/८/२०२३

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आनंदाचे डोही… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

☆ आनंदाचे डोही… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

मॉर्निंग वॉकवरून येताना गणपती मंदिरा जवळ रथ बाहेर काढलेला बघून एकदम मन आनंदाने उसळले.एक नवचैतन्य सळसळले.का बरं असं होत असावं ?माझाच मला मी प्रश्न विचारला.एखादी गोष्ट आपल्या बालपणाशी निगडित असली की आपण खूप आनंदी होतो.कारण त्या गोष्टीमागे,गोष्टीसोबत बऱ्याच घटना,बऱ्याच आठवणी निगडित असतात.एखादी मोत्यांची माळ सुटत जावी तशी आठवणींची लड सुटत राहते न आपण प्रफुल्लित होतो.उत्सव म्हणलं की चैतन्य,उत्साह,आनंद,परंपरा,ऊर्जा आणि गजबज.कोणताही सार्वजनिक उत्सव माणसांनी याचसाठी चालू केला की दररोजच्या त्याच त्या रुटीन मधून वेगळेपणा जगावा,सर्वांनी एकत्र येऊन आनंदी क्षणांची देवाणघेवाण करावी आणि जगण्यासाठी नव ऊर्जा प्राप्त व्हावी.मरगळलेपणा जाऊन उत्साह यावा,नवचैतन्य यावे.वेगळा आहार- विहार करावा अन अगदी सर्वच तळागाळातील शेवटच्या घटकाचे समाजमन देखील आनंदी व्हावे.

गणेश चतुर्थी आली की तासगाव संस्थानच्या गणपती मंदिरातला गणपतीचा तीन मजली लाकडी रथ बाहेर काढला जातो व स्वच्छ केला जातो.गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी खूप मोठी यात्रा भरते व या रथातून श्रींची मिरवणूक काढली जाते.त्यासाठी पंचधातूच्या धातूची मूर्ती मंदिरातून बाहेर काढली जाते.

उत्सवाच्या अगोदर ठिकठिकाणी गणपती मूर्तींचे स्टॉल लागले जातात.वेगवेगळ्या आकाराच्या,रूपाच्या,रंगांच्या आकर्षक लोभस मूर्ती पाहून  मन हरखून,भान हरपून जाते.सजावटीच्या वेगवेगळ्या साहित्याचा बाजार भरतो.

श्रीमंत भाऊसाहेब पटवर्धन गणपतीपुळेच्या सिद्धी विनायकाचे निस्सीम भक्त होते.त्यांना गणपतीने दृष्टांत देऊन तासगावचे मंदिर बांधून घेतले व पूजा करायला सांगितले.त्यानुसार त्यांनी तासगावात सांगली रस्त्यावर पूर्वाभिमुख मंदिर बांधले.इथला गणपती उजव्या सोंडेचा असून तो नवसाला पावतो असा समज आहे.मंदिराच्या पुढं दाक्षिणात्य पद्धतीची गोपुरे आहेत.सम्पूर्ण बांधकाम विशिष्ट दगड-चुन्यातील असून स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे.राजवाड्यातील दीड दिवसांच्या गणपतीच्या विसर्जना प्रित्यर्थ इथे मोठी रथयात्रा भरते.कोरोनाची दोन वर्षे सोडली तर अखंड अडीचशे वर्षांची परंपरा इथल्या यात्रेला आहे.

रिमझिम पाऊस,उन्हाचे मधूनच डोकावणे,हिरवेगार पीक,कडधान्याची काढणी,मळणी,विशिष्ट प्रकारचे गवततुरे,गवतफुले,भिरभिर रंगीत फुलपाखरे,वातावरणातील अनामिक चैतन्यआणि त्यासोबत येणारा गणपती उत्सव आणि त्या अनुषंगाने होणारी लगबग मला बालपणीच्या सगळ्या आठवणीत घेऊन जाते.

उत्सव…गणेश प्रतिष्ठापना,त्यासाठी लागणारी पाने,फुले..मग घरोघरी गौरी,त्यासाठी लागणारा फुलोरा शोधण्यासाठी सगळ्या गावंदरी पालथ्या घालणे,गौरींची घरोघरींची सजावट बघायला जाणे,सार्वजनिक मंडळाचे देखावे बघायला जाणे,त्यांनी ठेवलेले फुकटचे पिक्चर बघायला जाणे,गौरींचे कान उघडायला काटवटी, पराती जोरजोरात करकर वाजवणे,जत्रेसाठी घरोघरी पाहुण्यांचे आगमन सर्वच आठवते न मन  उल्हसित होते.

आमच्या गल्लीत रमेश (आमच्या भाषेत रमशा)गणपती करतो अगदी दहावीत असल्यापासून त्याने शाडूच्या मूर्ती बनवायला सुरुवात केली.बेंदराच्या अगोदरच तो माती भिजवून चिखल करून मूर्तीच्या तयारीला लागायचा.दुपारी शाळेतून आलं की तो मूर्ती बनवताना,रंगकाम करताना आमचे तास न तास हरवणे सगळं आठवतेय.लहानपणी गणपतीची सर्वात लहान मूर्ती सव्वा रुपयाला मिळायची.रात्री आणायला गेलं की मग एकच रुपयाला.सव्वा दोन रु,पाच रुपये,दहा रुपये अशी मूर्तींची किंमत असायची.सर्वात महाग गणपतीमूर्ती पंचवीस रुपयाला मिळायची.

पण सर्वजण घरोघरी लहान मूर्तीच आणत.खरेतर दिवळीपूर्वीचे सर्व सण निसर्गाच्या वेगवेगळ्या रुपांच्या संगतीने पार पडतात;अर्थात भौगोलिक परिस्थितीनुसार मग देवाला नैवेद्यही तसाच शेती भातीशी निगडित असतो.आमच्याकडे गौरीला शेपूची भाजी आणि ज्वारीच्या भाकरीचा नैवेद्य असतो.पाच दिवस घरोघरी आरती करायला जायचे.चुरमुऱ्याचा प्रसाद खायचा.दोन दिवस सलग सुट्टी असायची.ओढे,विहिरी,तळी जिकडे तिकडे पाणी असायचे.पाचव्या दिवशी विहिरीत ओढ्यात घरगुती गणपतीचे विसर्जन करून मनात अपार उत्साह भरून माणसे आपापल्या कामाला लागायची.घरातून एखादा माणूस गावाला गेल्यासारखे जीवाला हुरहूर लागायची  गणपती विसर्जनानंतर.

आता काळ बदललाय.साधेपणा जाऊन दिखाऊपणा आलाय,सार्वजनिक मंडळाचे स्वरूप देखील बदललंय. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती,रासायनिक रंगामुळे उरल्या सुरल्या स्वच्छ पाण्याचे साठे प्रदूषित होत आहेत. नद्या,तलाव प्रदूषित होत आहेत,पण त्याची कुणाला फिकीर नाही.जो तो आपापल्या नादात आहे.

मला निसर्गाबरोबर रहायला आवडते.आम्ही आम्हाला परवडेल अशी शाडूची मूर्ती आणतो.यावर्षी तर ठरवलंय की पुढील वर्षी धातूची मूर्ती आणायची अन तीच पुजायची.मातीचा छोटा गणोबा कुंभारवाड्यातून आणून सोबत त्याचेही पूजन करायचे व त्याचेच विसर्जन करायचे.

आराशीला तर आम्ही कधीच थर्माकोल वापरत नाही त्यामुळं दिव्याची रोषणाई आणि कृत्रिम फुलांच्या माळा वापरून परत ते सर्व काढून बांधून ठेवतो.

तुम्हालाही एक विनंती.जमले तर शाडूचीच मूर्ती आणा आणि पर्यावरण रक्षणात खारीची भूमिका बजवा.येणारा गणेशोत्सव तुम्हा सर्वांना आनंददायी,आरोग्यदायी ठेवो हीच मंगल, शुभ कामना.

मंगल मूर्ती मोरया ss

गणपती बाप्पा मोरया ss

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “नारळी पौर्णिमा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “नारळी पौर्णिमा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

ह्यावेळी अधिक महिन्यामुळे सगळया सणाना जरा विलंबच झाला . कधीपासून श्रावणाची वाट बघत होतो, नुकतेच श्रावणाचे आगमन झाल्याने एक प्रकारचा उत्साह आला.  नारळीपोर्णिमा आणि रक्षाबंधन हे दोन्ही सण कधीकधी एकाच दिवशी तर कधीकधी लागोपाठच्या दोन वेगवेगळ्या दिवशी येतात.पोर्णिमेची तिथी दोन दिवसात विभागल्या गेली तर आधीचा दिवस नारळी पोर्णिमा आणि नंतरचा दिवस राखीपोर्णिमा.

सणसमारंभ आले की बाजारात जरा चहलपहल,लोकांमध्ये जरा उत्साह आलेला नजरेस पडतो. आपले हे सणसमारंभ आपल्याला मानसिक मरगळतेतून बाहेर काढतात आणि मनाला एकप्रकारची उभारी आणतात.

तसे हे दोन्हीही सण विदर्भातील नाहीत. नारळीपोर्णिमा हा सण कोकणातील, प्रामुख्याने सागरीकिनारा लाभलेल्या भागातील. तर रक्षाबंधन वा राखीपोर्णिमा हा सण प्रामुख्याने उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश ह्या भागातील, पण आजकाल सगळे सणवार हे बहुतेक सगळ्या भागांमध्ये साजरे केल्या जातात.

नारळीपोर्णिमा हा सण कोळी लोकं वा समुद्रकिनारी राहणाऱ्या, तेथे वस्ती करणाऱ्या लोकांसाठी अतिमहत्त्वाचा सण.नारळीपोर्णिमेच्या दिवशी समुद्राच्या किनाऱ्यावर कोळी लोकं नारळ  वाढवून खवळलेल्या समुद्राला शांत होण्याकरिता प्रार्थना करतात. ह्या दिवसापासून मासेमारी

 साठी ते आपापल्या होड्या घेऊन सागरात उतरतात आणि गेले काही दिवस त्यांनी बंद ठेवलेल्या व्यवसायाचा परत एकदा श्रीगणेशा करतात. आता हा दर्याच त्यांचा मायबाप, देव सगळंकाही असतो.नारळीपोर्णिमेचा खास  पदार्थ म्हणजे नारळीभात. ओल्या नारळाचा चवं,लवंग, बेदाणा,साखर आणि चांगल्या प्रतीचे तांदूळ ह्यापासून नारळीभात करतात. ह्यात केशराच्या काड्या मिसळल्या तर सोने पे सुहागाच. नारळीभातासाठी लागणारे मुख्य साहित्य हे कोकणात पिकणारे तसेच समुद्रकाठावरील.कोळी लोकं हा दिवस त्यांची पारंपरिक नाच,गाणी करीत खूप उत्साहाने साजरा करतात.

रक्षाबंधन वा राखीपोर्णिमा हा सण बहीणभावाच्या प्रेमाचे,स्नेहाचे प्रतीक म्हणून साजरा केल्या जातो.परगावी असलेल्या. बहीणी आठवणीने, न चुकता भावाला राखी पाठवतात. आपली संस्कृती, सणांची जपणूक ह्यामुळे ह्यादिवशी हाताला राखी न बांधलेला पुरुष अभावानेच आढळत असेल.ह्यादिवशी कित्येक भगिनी आपल्या सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिकांना राखी बांधायला जातात वा राखी पाठवितात.

लहानपणी साजरी केल्या गेलेले रक्षाबंधन खूप अनोखे असायचे.माझा भाऊ तर आधी पूर्ण बाजार हिंडून त्याला आवडलेल्या राख्या आणि ते दुकान सांगायचा.तेथून आम्ही बहीणी राख्या आणायचो,मोठ्ठ्या चमकीच्या आणि नोटांनी सजविलेल्या वगैरे.तेव्हाच तो एक कर्तबगार, यशस्वी बँकर होणार ह्याची नांदी असावी. असो लहानपण खूप छान आणि निरागस,अल्लड असतं.

राखीपोर्णिमा वा रक्षाबंधन ह्या संकल्पनेचा संबंध हा रक्षणाशी निगडित आहे. भाऊ आणि बहीण ह्यांच नातं प्रेमाचं,जिव्हाळ्याचं स्नेहाचं आणि तितक्याच हक्काचं सुद्धा असतं. ह्या दिवशीच्या निमित्ताने हे एकमेकांना भक्कम आधार देणारं नातं ,संकटसमयी रक्षा करण्याचं वचन देणारं नात तर महत्वपूर्णच, पण ह्या सणा च्या निमित्ताने अजूनही कितीतरी भक्कम आधार देणारी, रक्षा करणारी,अशी अजूनही कितीतरी नाती असतात.ह्या दिवशी हटकून ह्या नात्यांची,ह्मा भावनांची जपणूक करणाऱ्यांची हटकून आठवणं येते आणि त्यासाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त कराविशी वाटते.ह्या भक्कम आधारामध्ये आपल्याला सुरक्षित ठेवणारे लष्करातील जवान,आपल्या जिवीताची काळजी घेणाऱ्या वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असणारी प्रत्येक व्यक्ती, आपल्या नागरी सुरक्षा राखणा-या पोलीस खात्यातील प्रत्येक व्यक्ती, आपल्या आरोग्याच्या काळजीत मोलाची मदत करणारे सफाई कामगार तसेच ह्या प्रकारच्या तत्सम क्षेत्रातील आपली रक्षा करणारी,आधार देणारी कुठल्याही व्यक्ती चे ह्या  त्यांनी पुरविलेल्या रक्षणाच्या कार्याप्रती मी मनापासून आदर,कृतज्ञता व्यक्त करते.ह्या दिवशी आपल्याला आधार देणा-या वनसंपदेला पण विसरून चालणार नाही. तेव्हा ह्या सगळ्यांची आठवण काढून त्यांच्याप्रती असलेल्या अभिमानाने खूप छान वाटतं.

आपल्याला भावनिक आधार देणारी,आपलं मनोबलं वाढविण्यास मदत करणारी एक शक्ती असते,मी त्या शक्तीला “देव” म्हणते,ह्या शक्तीलाही माझे कायम रक्षण करण्यासाठी एक राखी अर्पण.

खरंच धन्य आपली विवीधतेने नटलेली भारतभूमी, जेथे आपण सर्वधर्मसमभाव जोपासून सगळे सणवार गुण्यागोविंदाने, प्रेमानेआत्मियतेने आणि उत्साहाने साजरे करतो.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नाती विणता विणता… ☆ श्री सतीश मोघे ☆

श्री सतीश मोघे

🌸 विविधा 🌸

नाती विणता विणता… ☆ श्री सतीश मोघे

ऊबदार आणि रेशीमस्पर्शी नाती प्रत्येकालाच हवीहवीशी वाटतात. तहहयात अशा नात्यांचा अनुभव येणे हा नशिबाचा भाग. पण प्रत्येकानेच अश्या नात्यांचा अनुभव केव्हातरी, काहीकाळ तरी घेतलेलाच असतो. एकाच नात्यातही हा अनुभव कधी येतो तर कधी येत नाही. नात्यात जेव्हा हा अनुभव येतो, तेव्हा आपण त्याचे श्रेय मनातल्या मनात स्वत:ला आणि समोरच्यालाही देत असतो. अर्थात त्यातही बऱ्याच नात्यात जादा श्रेय आपण स्वत:कडेच घेत असतो. याच न्यायाने ऊबदार, रेशीमस्पर्शी अनुभव येत नाही,तेव्हाही खरे तर याचा दोष दोघांनी वाटून घेणे आणि त्यातही दोषातला अधिक वाटा आपण घेणे उचित ठरते. पण असे घडत नाही. अशा प्रसंगात सर्व दोष समोरच्याच्याच माथी मारुन आपण मोकळे होतो.

सुज्ञ व्यक्ती मात्र असे करत नाहीत. नात्याचे वस्त्र सुखकर, सुंदर विणले गेले नाही, ‘मन नाती विणता विणता, मन ठेवी करुनि गुंता’ असे घडले, तर या गुंत्याचा दोष त्या व्यक्ती स्वत:कडे घेतात. आपणच या नात्याचे वस्त्र विणण्याच्या कौशल्यात कमी पडलो, असे म्हणून ते कौशल्य आत्मसात करण्याच्या प्रयत्नाला लागतात. गुलजारांची एक सुंदर कविता आहे. कवयित्री शांता शेळके यांनी या कवितेचा तेवढाच सुंदर मराठी भावानुवाद केला आहे. ही कविता विणकाम करणाऱ्या विणकराला उद्देशून आहे. गुलजार म्हणतात, ‘हे विणकरा, तूझे विणकाम अखंड चालू आहे. धागा कधी तुटतो, कधी संपतो. तू पुन्हा नव्याने विणकाम सुरु करतोस. पण एकसंध. त्यात कुठेही गाठी नाहीत. मी एकदाच नात्याचे वस्त्र विणायला घेतले मात्र… त्याच्या अनेक गाठी मला दिसत आहेत. तेव्हा हे विणकरा, गुंता होऊ न देता, गाठी पडू न देता वस्त्र विणण्याचे हे तुझे कौशल्य तू मला शिकव. या कवितेतला संदेश मोलाचा आहे. किमान हवीहवीशी वाटणारी, पण तरीही दूरावत आहेत असे दिसणारी नाती तरी, हे कौशल्य आत्मसात करून सांभाळणे, पुन्हा त्यात जवळीकता आणणे आवश्यक आहे.

नात्यात कौशल्याचा वापर करण्यावर आक्षेपही असू शकतो. प्रेमाच्या, आपलेपणाच्या नात्यात कौशल्यासारखी तांत्रिक गोष्ट का? आणि कशाला हवी? हे प्रश्नही उपस्थित होऊ शकतात. त्याची उत्तरे देणेही आवश्यक आहे. कोणतेही कौशल्य शिकतांना सुरुवातीस तांत्रिक वाटते, पण तेच एकदा पूर्णतः आत्मसात झाले की तो आपला सहजस्वभाव होते. आपल्या घरी दुरुस्तीसाठी येणारा इलेक्ट्रिशियन, विद्युत प्रवाह सुरू असतांनाही दुरुस्तीचे काम करत असतो. त्याने प्राप्त केलेले कौशल्य त्याचा सहजस्वभाव होऊन जाते. त्याला आल्यावर आधी पुस्तक उघडून काही वाचावे लागत नाही वा थांबून पुढचा टप्पा काय? असे आठवावेही लागत नाही. नात्यांच्या विणकामातले कौशल्यही असेच आहे. सुरुवातीस ते शिकावे लागेल. पण एकदा का अंगवळणी पडले की ते सहजस्वभाव होऊन राहील. गाठी न पडता वस्त्रांची वीण करणे सुलभ होऊन जाईल.

अन्य कामातले कौशल्य हे बुद्धीचे असते. बुद्धीच ते आत्मसात करते आणि बुद्धीपर्यंतच ते सीमीत रहाते. फार तर हात, पाय असे आवश्यक देहांचे अवयव करावयाच्या कामाच्या आवश्यकतेनुसार त्यात सहजपणे सामील होतात. पण मनाने स्वतंत्रपणे त्यात करण्यासारखे काही नसते. नात्यांतील विणकामाचे कौशल्य मात्र मनाचे असते,मनापासून असते. ते वापरत असतांना बुद्धीला काय वाटते आहे, याचा फार विचार न करता पुढे जायचे असते. कारण  नात्यांच्या विणकामातले हे कौशल्य स्वतःच्या हितापेक्षा समोरच्याच्या  हिताचाच अधिक विचार डोळ्यासमोर ठेऊन मनाने आत्मसात केलेले असते व मनाकडून त्याचा वापर होत असतो.बऱ्याचदा समोरच्याला हे कळायला वेळ लागतो. पण कधीतरी ते कळतेच . 

समोरच्याच्या हिताच्या विचाराबरोबरच समोरच्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्याची वृत्ती आणि  नात्यात समोरच्याची वारंवार परीक्षा न घेण्याची वृत्ती, ही  नात्यांच्या विणकामातील आवश्यक दोन मुख्य कौशल्ये आहेत. पत्नीच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण जर असा विचार करायला लागलो की, बघू या हिचे प्रेम खरे आहे का? आज काहीच भेट नको नेऊ या.तरी तिचे प्रेम तसेच राहते  का बघू या…तर गुंता झाला आणि गाठ  पडलीच म्हणून समजा. असा विचार करण्यापेक्षा आपण मोगऱ्याचा गजरा, सोनचाफ्याची फुले आणि एखादी छोटीशी भेटवस्तू घेऊन गेलो तर ती पाहून तिला किती आनंद होईल ! असा विचार प्रबळ होऊन तिचा आनंदी चेहरा डोळ्यासमोर आला की नकळत आपल्याकडून तशी कृती होते. त्यातून दोघांना आनंद होतो. नात्याची वीण अधिक घट्ट होते. विणकाम नवीन उत्साहात सुरु होते. केवळ पती- पत्नी नात्यात नव्हे तर कोणत्याही नात्यात वारंवार समोरच्याची परीक्षा घेणे टाळणे आणि ज्या काही छोट्या छोट्या गोष्टींनी त्याला आनंद होईल, अशा गोष्टी करणे, नाती सुखदायी होण्यासाठी आवश्यक असते.

नात्याचे वस्त्र विणतांना त्याग करण्याची वृत्ती असणेही आवश्यक असते. हा त्याग काही फार मोठा असा अपेक्षित नसतो. समोरच्याला ‘तू माझ्यासाठी खूप विशेष आहेस’,असे सांगणारी लहानशी कृतीही यात पुरेशी असते. आपला मित्र एखादे पुस्तक किंवा औषध त्याच्या गावी मिळत नसल्याचे आपल्याला कळवितो व  मिळालेच तर पाठव,असे सांगतो.खरे तर वाट पाहण्याची त्याची तयारी असते. पण आपण त्याच दिवशी खास वेळ काढतो, बाजारात शोधून ते पुस्तक किंवा औषध मिळवितो आणि त्याला कळवितो, ‘तुझे काम केले आहे.’ या आपल्या कृतीतून आपल्यासाठी तो ‘विशेष आहे’ हा संदेश त्याच्यापर्यंत पोहोचतो. मैत्रीचे नाते अधिक घट्ट होते.   

जीवनप्रवासात आलेल्या नात्यांपैकी काहीच नाती आपण हदयाशी जपतो. ही अशी जपलेली  नाती आठवून पाहा. यातील प्रत्येकाने, किमान एकदातरी ‘तुम्ही त्याच्यासाठी विशेष आहात’, हा अनुभव तुम्हाला देणारी कृती तुमच्यासाठी आणि तुम्हीही त्याच्यासाठी केल्याचे नक्कीच आठवेल.

नात्याचे वस्त्र विणण्याची अशी अनेक कौशल्य सांगता येतील. लेखनमर्यादा लक्षात घेता, शेवटची  आणखी दोन कौशल्ये नमूद करतो. त्यातले पहिले म्हणजे समोरचा सुखात असतांना आपले दुःख व्यक्त न करणे  आणि समोरचा दुःखी असतांना आपले सुख लपविणे आणि दुसरे म्हणजे नात्यात केवळ ‘सांगणारे’ न होता ‘ऐकणारे’ही होणे. समोरच्याच्या सुखात सहभागी होऊन त्याचे सुख दुप्पट करणे आणि दुःखात सहभागी होऊन दुःख निम्मे करणे ही भावना मनात रुजलीच पाहिजे. अनेकदा मित्रांच्या व्हाट्सॲप ग्रुपवर एखाद्याच्या जवळच्या नातलगाच्या दुःखद निधनाची बातमी येते. किमान त्या दिवशी तरी हास्य, विनोदाच्या पोस्ट ग्रुपवर टाकणे टाळले पाहिजे. तेच एखाद्याने आधीच आनंदाची पोस्ट शेअर केली असेल तर दुसऱ्याने ग्रुपवर दुःखाची बातमी शेअर करणे टाळले पाहिजे. ही साधी सोपी पथ्ये आहेत. परस्परांच्या सुखदुःखाशी एकरूप झाले तरच ही पाळली जातात.ही पाळली गेली तरच मनात अढी बसत नाही,नात्याच्या वस्त्राच्या विणकामात गाठी पडत नाहीत. अशी संवेदनशीलता असेल तरच दुसऱ्याला समजून घेणे,ऐकून घेणेही घडते.

काही नाती जन्मताच मिळतात. काही नाती विवाहाने व त्यानंतर जीव जन्माला घालून आपण  निर्माण करतो. काही मैत्रीची, सख्यत्वाची नाती असतात. तर काही नाती कारणपरत्वे आयुष्यात ये-जा करणारी असतात. या सर्व प्रकारच्या नात्यात प्रत्येक व्यक्तीशी असणाऱ्या नात्याचे वस्त्र स्वतंत्र असते, त्याचे विणकाम स्वतंत्र असते. पण या प्रत्येक विणकामात गुंता,गाठी न होण्यासाठी वर सांगितलेली कौशल्ये आवश्यकच असतात. यासोबतच  अलिप्तता आणि भावनिक गुंतवणूक या दोन रंगांच्या धाग्यांपैकी कुठला धागा, कुठल्या वस्त्राच्या विणकामात जास्त वापरायचा?याचे विवेकी ज्ञान देखील आवश्यक आहे. कौशल्ये प्राप्त होऊनही या रंगांचे प्रमाण चुकले तरी फसगत होते. ‘मन नको त्यावरि बसते, मन स्वत: स्वत:चि फसते, नसत्याच्या धावे मागे’, असे होऊन बसते. यासाठी अलिप्तता आणि भावनिक गुंतवणूक यांचे योग्य प्रमाण ठेवण्याचे कौशल्यही आवश्यक आहे. काही नाती सुटावीशी वाटत असूनही सुटत नाहीत, तोडावीशी वाटत असूनही तोडता येत नाहीत. काही तुटतात, त्यातली काही पुन्हा येऊन जुळतात. नात्यांचे हे असेच असते,हेही समजून असले पाहिजे. सर्व कौशल्य आणि अलिप्तता-भावनिक गुंतवणुकीचे योग्य प्रमाण राखूनही नात्यांची वीण जुळत नसेल, जमत नसेल, तर  त्या नात्यांवर जास्त वेळ खर्च न करता ,काही काळ ती नाती आणि विणकाम बाजूला ठेवलेले बरे.

प्रत्येक नात्याच्या मधुमासाचा एक काळ असतो. काही नात्यात तो अल्पकाळ, तर काही नात्यात तो दीर्घकाळ चालतो. या सुरुवातीच्या मधुमासाच्या काळात परस्परांना समजून घेतले आणि ते नाते टिकविण्यासाठी कोणती कौशल्ये आवश्यक आहेत, हे समजून घेऊन,प्राप्त करून घेऊन, योग्य प्रमाणात अलिप्तता आणि भावनिक गुंतवणूकीची गुंतवणूक केली तरच ती नाती मधुमास संपल्यावरही लाभदायी, आनंददायी ठरतात. असे होण्यासाठी  गुलजारांनी केलेली प्रार्थनाच आपणही विणकराला करू या. ‘प्रिय विणकरा, नात्याचे वस्त्र विणण्यासाठी तुझे कौशल्य आम्हाला तू शिकव.’

© श्री सतीश मोघे

मो – +91 9167558555

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सत्ते पे सत्ता..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

सत्ते पे सत्ता..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

 सत्ताया शब्दाला वेढून राहिलेला माजोरीचा उग्र दर्प या शब्दातील विविध चांगल्या अर्थाचे कोंब झाकोळून टाकणारा ठरतो.

खरंतर सत्ता वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी नसतेच. रक्ताच्या असो वा मैत्रीच्या,जोडलेल्या,मानलेल्या विविध अतूट नात्यांचा अविभाज्य  भाग असणारी मायेची, प्रेमाची सत्ता कधीच विध्वंसक नसते. ती संजीवकच असते.

आईवडिलांना त्यांच्या अपत्यांवरील मायेच्या नात्यातून मिळणाऱ्या सत्ता/अधिकारात मायेचा पाझर आणि आपल्या अधिपत्याखाली असणाऱ्या पाल्याच्या हिताची काळजी यांचेच प्राबल्य असते आणि सत्ता या शब्दाला तेच अपेक्षित आहे. म्हणूनच कौटुंबिक पातळीवरील अशा गृहीत सत्तेच्या बाबतीतही प्रेम आणि आदर यांची जागा जेव्हा अधिकार आणि वचक घेऊ लागते तेव्हा मात्र ती सत्ताही संजीवक न रहाता विध्वंसक बनू लागते.

खरंतर सत्ताही निसर्गानेच स्वतःचं अधिपत्य अबाधित ठेवून निसर्गावर अवलंबून असणाऱ्या सर्वच निसर्ग घटकांच्या व्यवस्थापन सुविहित रहावं या उद्देशाने निसर्गनिर्मितीपासूनच अस्तित्वात आणलेली एक व्यवस्था आहे. सर्व प्राणीमात्रांमधे या सत्तेचं स्वरूप अर्थातच वेगवेगळं असतं. आपण माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे असं म्हणतो. पण खरं तर विविध पक्षी आणि प्राणी यांचे जीवनपद्धती पाहिली की त्यात वैविध्य असलं तरी एकमेकांच्या सोबतीने राहण्याची त्यांच्यातील असोशी हा एक समान धागा असल्याचं आपल्या लक्षात येतं. पक्ष्यांचे थवे, माकडांचे कळप, हत्तींची एकत्रकुटुंबे,समुहाने ‌चरणारी जनावरे ही याचीच प्रतिके म्हणता येतील. या विविध पक्षीप्राण्यांमधे त्यांच्या त्यांच्या जीवन पद्धतीनुसार असणार सत्ताकेंद्र आणि त्याचं स्वरूप हा सखोल अभ्यासाचाच विषय ठरावा. अशा जाणीवपूर्वक केलेल्या अभ्यासातून आकाराला आलेली व्यंकटेश माडगूळकर यांची सत्तांतरही कादंबरी माकडांच्या कळपातील प्रमुखाची सत्ता/वर्चस्व आणि योग्य वेळ येताच त्यात होणार सत्तांतर यांचं अतिशय अचूक आणि नेमकं चित्र करते.

या नैसर्गिक व्यवस्थेत सत्तेमुळे मिळणारा अधिकार आणि वर्चस्व हे गृहीत आहेच पण ते सत्तेमुळे आलेल्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पूर्ण करून अवलंबितांचं संगोपन, रक्षण, हित आणि समाधान जपण्याचं मुख्य कर्तव्य योग्य पद्धतीने पार पाडता यावं यासाठीच. याचं भान पर्यावरणाच्या घातक पडझड विध्वंसानंतरही इतर सर्व निसर्ग घटकांनी आवर्जून जपलेले दिसून येतं. अपवाद अर्थातच फक्त माणसाचा!!

म्हणूनच सत्ताया शब्दात मुरलेल्या माजोरीच्या उग्र दर्पाला जबाबदार आहोत आपणच.सत्तेला अपेक्षित असणारी कर्तव्य आणि जबाबदाऱ्या विसरून सत्तेचे थेट नातं राजकारणाशी जोडलं गेल्याचा हा परिणाम! खुर्चीच्या असंख्य किश्शांमधे सत्तेचा लोभ महत्त्वाचा घटक ठरत गेल्याचं आपल्या लक्षात येईल. त्यामुळेच सत्ता प्राप्त होताच ती अबाधित ठेवण्याच्या अतिरेकी हव्यासामुळे सत्य न् स्वत्वाचं मोलही सहजी खर्ची घालण्याची अतिरेकी प्रवृत्ती मूळ धरु लागते आणि हळूहळू फोफावते.मग राजकारण ही व्यवस्था न रहाता विधिनिषेध धाब्यावर बसवून खेळला जाणारा क्रूर खेळ होऊन जातो.अशा परिस्थितीत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठीच्या कटकारस्थाने सत्तेपे सत्ताहा जशास तसे या न्यायाने परवलीचा शब्द होऊन बसतो!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सेल्फी… ☆ डॅा. सौ. पुष्पा सुभाष तायडे ☆

डॅा. सौ. पुष्पा सुभाष तायडे

? विविधा ?

☆ सेल्फी… ☆ डॅा. सौ. पुष्पा सुभाष तायडे ☆

आजच्या या आधुनिक युगात प्रत्येकाकडे मोबाईल आहेत. मोबाईल मध्ये फोटो काढायचा कॅमेरा देखील असल्यामुळे फोटो काढायचे वेड दिवसेंदिवस वाढतच आहे. फोटो काढून देणारा व्यक्ती नसेल तेव्हा सेल्फी काढला जातो. स्वतःलाच स्वतःचा फोटो काढता येत असल्याने त्याची मजा काही औरच आहे. अलीकडील तरूण पिढी तर सेल्फी काढण्यासाठी वेडी झालेली दिसतात. एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी पाण्याच्या जवळ समुद्रकिनारी प्रेक्षणीय स्थळी  परिसर चांगला असेल तिथे  वाटेल त्या त्या प्रसंगाचे सेल्फी फोटो काढून आठवणीच्या संग्रहात ते ठेवले जातात. अशा फोटोमुळे निश्चितच आयुष्यातील चिरस्मरणीय प्रसंगाच्या स्मृती जपता येतात. हा एक महत्त्वाचा भाग आहे.

त्यामुळे सेल्फीने मानवाला दिलेला हा अमूल्य ठेवाच आहे.

अलीकडच्या तरुणांना तर या सेल्फीने वेडच लावले आहे. दिवसातून कितीतरी वेळा ते आपला स्वतःचा सेल्फी फोटो काढतात. मग पाहतात त्या अँगलने फोटो चांगला निघतो की या अँगलने चांगला निघतो याचा विचार करतात. चांगले निघालेले फोटो ठेवतात. खराब निघालेले डिलीट मारतात. आपल्या मित्रमंडळींसोबत ,कुटुंबातील व्यक्तींसोबत,गर्लफ्रेंड वा बॉयफ्रेंड सोबत असे सेल्फी फोटो काढण्यात त्यांना काही गैर वाटत नाही. गर्लफ्रेन्ड किंवा बॉयफ्रेंड सोबत पुढे लग्न झाले तर काही बिघडत नाही. परंतु दुसऱ्या व्यक्ती सोबत लग्न झाले तर अशा फोटोंचा गैरवापर करून ब्लॅकमेल करणारीही काही मंडळी असतात. आपले प्रेम यशस्वी झाले नाही तर नैराश्य येऊन दुसऱ्या व्यक्तीला देखील सुखाने जगू द्यायचे नाही असे मनाशी ठरवून अशा फोटोंचा गैरवापर करणारेही समाजात आढळतात. तेव्हा सेल्फी काढताना सावध राहणे आवश्यक आहे.सेल्फी काढताना प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे भाव पाहणे हा एक गमतीदार अनुभव असतो कधी रागाचे भाव चेहऱ्यावर असतात तर कधी हास्याचे भाव असतात. कधी चेहरा वाकडा तर कधी  हसमुख निघालेले फोटो ही गमतीदार असतात आपण आपल्या फोटोकडे पाहून हसायला लागतो.

सेल्फी म्हणजे स्वतःचा फोटो काढणे असा अर्थ आपण लक्षात  घेतो.  सेल्फी काढण्याच्या नादात काही अपघात घडून गेल्याचे व्हिडिओ आपण व्हाट्सअप वर पाहिले आहेत यात नदीच्या काठावर सेल्फी काढणाऱ्या मुलाचा पाय मगरीने धरला व मुलाला ओढून नेले कड्यावर उभे राहून सेल्फी काढताना खाली पडणे किंवा पाण्यात पडणे सेल्फी काढताना फोन पाण्यात पडणे अशा काही अपघाताची उदाहरणे आपण पाहिली आहेत. तेव्हा सेल्फी काढताना अपघात होणार नाही स्वतः सुरक्षित राहू याची काळजी घेणे देखील आपले कर्तव्य आहे. सेल्फी म्हणजे स्वतःचा फोटो काढणे असा वरवरचा अर्थ असला तरी आपण कसे आहोत हे पाहणे महत्त्वाचे आहे. स्वतःचे व्यक्तिमत्व जर प्रभावी बनवायचे असेल तर स्वतःच्या अंतरंगाचा सेल्फी काढायला पाहिजे. सेल्फी म्हणजे कॅमेरातून काढलेला बाह्य  स्वरूपाचा फोटो होय. परंतु बाह्य रंगापेक्षाही अंतरंग पाहणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. आपल्या स्वतःच्या अंतरंगाचा फोटो काढायचा असेल तर मला एका दिवसात किती वेळा राग येतो.

लहान सहान गोष्टींवरून माझी चिडचिड होते का?.

चिडचिड कमी करायची असेल तर मला या रागावर नियंत्रण कसे मिळवता येईल त्यासाठी मी काय करायला पाहिजे. माझ्यात या दिशेने परिवर्तन व्हायला पाहिजे. मला पैशाचा मोह होतो का अवैध मार्गाने पैसा गोळा करण्यासाठी माझे मन तयार होते का? हा मोह टाळून कष्टाने मिळवलेल्या पैशात समाधानाने राहण्याची वृत्ती माझी वाढीस लागलेली आहे का?

या दिशेने विचार करणे योग्य ठरते.

कोणतीही सुंदर स्त्री दिसली की कामांध होणे किंवा कोणत्याही सुंदर पुरुषाशी लगट करण्याची इच्छा होणे ही विकृतीच होय. संयमाने मनावर व अशा भावनांवर नियंत्रण ठेवण्याची पावले उचलायला हवीत. आजची तरुण पिढी तर अशा भावनांच्या अधिकच आहारी गेलेली आपल्याला दिसते. स्वतःच्याच रूपाचा व्यक्तिमत्त्वाचा अहंकार वाटणे व माझ्यापेक्षा कोणीही चांगले नाहीच. इतर सारे तुच्छ असे लेखण्याची भावना खूप लोकांमध्ये आढळते. हिंदी चित्रपटात गाणे आहे. गोरे रंगपे न ईतना गुमान कर. गोरा रंग दो दीनमे ढल जायेगा हेच सत्य आहे.  अहंकार जाईल व इतरांचा सन्मान करण्याची भावना वाढीस लागेल या दृष्टीने विचार करून पावले उचलावी. द्वेष आणि मत्सराची भावना ही जीवनात अस्वस्थता निर्माण करते.

कोणाचा न करी द्वेष , दया मैत्री वसे मनी!

असे रामदास स्वामींनी म्हटले आहे. द्वेष आणि मत्सराच्या भावनेला क्रोधाची जोड मिळून नको त्या घटना जीवनात घडून आलेली अनेक उदाहरणे आपण रोजच वर्तमानपत्रांमध्ये वाचतो. वेळीच या भावनेला लगाम घातला तर सर्व मंगल होईल. लोभापाई इतरांवर अन्याय करणारे लोक समाजात दिसतात अधिक धन प्राप्त करण्याचा लोभ व तेही विशेष कष्ट न करता मिळत असेल तर चांगलेच म्हणून त्यामागे धावणारे लोक लोभाने मनःशांती गमावतात. सातवा रिकामा हंडा भरावा म्हणून मरेस्तोवर काम करूनही तो भरत नाही म्हणून चिंताग्रस्त होण्याची कथा आपण ऐकली आहे. लोभापाई दिवसभर धावून जमीन पायाखाली घालणारा माणूस शेवटी पूर्वीच्या जागेपर्यंत पोहोचू शकत नाही आणि  अति धावल्यामुळे त्याचा मृत्यू होतो. ही कथा  सर्वांना माहिती आहे. लोभापाई जीवनाची माती करण्यात काय अर्थ आहे. काम क्रोध मद मोह आणि मत्सर या साऱ्या विकार विचारांना ताब्यात ठेवून जीवन जगाल तर तुमचा सेल्फी आनंदी हसमुख आणि शांत चेहऱ्याचा निघेल एवढे निश्चित.

© डॅा. सौ. पुष्पा सुभाष तायडे

नागपूर 

मो 9422119221.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जीवन… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? विविधा ?

☆ जीवन… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

प्रत्येकालाच जीवन हे जन्मानंतर लाभतं.कसं असतं बरं मानवी जीवन ?जीवन हवहवसं तेंव्हाच वाटतं जेंव्हा तुम्ही त्यात काही आनंदाचे ,सुखाचे क्षण निर्माण करता.जन्मानंतर जेंव्हा तुम्ही मोठे होता,संस्कारातून  सुजाण बनता,तेंव्हा मंगेश पाडगावकर जी म्हणतात त्याप्रमाणे “या जन्मावर,या जगण्यावर शतदा प्रेम करावे ,”या त्यांच्या गीतानुसार

जीवनाची वाटचाल आनंदानं,प्रेमानं,स्नेह जोपासत करणं श्रेयस्कर ठरतं.जीवनात प्रत्येक वेळी समोर सुखच येतं असं नाही पण भगवदगीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्यानुसार

“सुखदु:ख समेत्कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ” ही वृत्ती जर आपण ठेवली तर सुख लाभो किंवा वाट्याला दु:ख येवो,यश मिळो किंवा पराभवाचा सामना करायला लागो,आपण दोन्ही गोष्टींकडे तटस्थ वृत्तीने पाहावे हे तत्वज्ञान अंगिकारता येते.अर्थात हे सोपे नाही.

जीवन प्रत्येकाला जसं तो पाहतो तसं त्याच्या दृष्टिकोनानुसार भासतं.दृष्टीकोनाबाबत बोलताना मला नुकतीच वाचलेली एक गोष्ट आठवते.एके ठिकाणी तीन पाथरवट दगडावर छिन्नीचे घाव घालीत होते.जवळच बांधकाम सुरू असलेलं एक मंदिर होतं.रस्त्याने एक वाटसरू चालला होता.त्याने त्या तिघांपैकी एकाला विचारले,”तू काय करतो आहेस ?”तो त्रासिक स्वरात उत्तर देतो,”मी छिन्नीने दगड फोडतो आहे.त्रासाचं काम बघा.”नि घाम पुसतो.वाटसरु दुसर्या पाथरवटास तोच प्रश्न विचारतो.तेंव्हा तो मोठा उसासा टाकतो नि म्हणतो,”अरे बाबा,पैटासाठी कष्टाचं काम करतोय मी.”वाटसरु तिसर्या पाथरवटासही तोच प्रश्न विचारतो,”बाबा रे,काय चाललय तुझं?” तेंव्हा तो मात्र अभिमानाने म्ज्ञणतो,इथं हे जे मंदिर उभं होतय ना,ते बांधण्यास मी मदत करीत आहे.”तीनही पाथरवट एकच काम करीत होते.दगडाला आकार देण्याचे.पण एकाला ते त्रासिक,कंटाळवाणे वाटत होते,दुसर्याला पोटासाठी राबणे वाटत होते नि तिसर्याला मात्र एका सुंदर निर्मितीस आपण हातभार लावीत आहोत याचा अभिमान वाटत होता -आनंद वाटत होता. तसच कोणाला जीवन पहाटेच्या सुंदर दवासारखं  वाटतं,तर कोणाला शीतल वायुच्या झुळकी सारखं, एखाद्या खवय्याला ते रसास्वादी जिव्हेच्या तृप्तीसारखं भासतं,तर एखाद्या लढवय्याला ते रणांगणासारखं वाटतं.नि मल्लाला आखाड्यासारखं.जीवन हवहवसं तेंव्हाच वाटतं जेंव्हा आपण प्रत्येक क्षणी ते समरस होऊन जगतो.आपल्या जीवनात बालपणापासून वार्धक्यापर्यंत आपल्या वाट्याला अनेक भूमिका येतात.बालपणी विद्यार्जन,ज्येष्ठांच आज्ञापालन केलं तर शिक्षणात यवस्वी होऊन आपण नोकरी किंवा व्यवसायात स्थिरस्थावर होतो.विविध भावना नि नात्यांची जपणूक करुन वृद्धापकाळी आपण मार्गदर्शकाची भूमिका पार पाडू शकतो.फक्त जीवनात उद्योग शीलता जपणे महत्त्वाचे ठरते.एक सुभाषितच  सांगते –

उद्यमेनहि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथै:। 

नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृग: ॥ 

याचा अर्थ असा कि, उद्योग केल्यानेच आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात ‌झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण आपोआप प्रवेश करीत नाही. तर त्यासाठी त्याला शिकार करावी लागते.

जीवनात कुठेतरी श्रद्धा नि समोर एखादे ध्येय असूल तर जीवनाचा प्रवास योग्य दिशेनं होतो.नाहीतर ते भरकटते.अलिकडे वृत्तपत्रात जीवनाचा आस्वाद न घेताच ते संपवू पाहणारी तरुणाई दिसते नि मन अगदी विषण्ण होतं.विवेकाने,सकारात्मक दृष्टिकोनातून जर विचार पूर्वक वर्तन केलं तर जीवन हवहवसं वाटतंनि सार्थकी लावता येतं.आकाशातील इंद्रधनुष्य जसं तानापिहिनिपाजातुन खुलतं ,तसं मानवता,श्रम , सहिष्णू वृत्ती,प्रमाणिकपणा,सत्शील वृत्ती,त्याग,प्रेम,यासारख्या सदगुणातून बुद्धीला कृतीची जोड देऊन मानवी जीवन सार्थकी लागततं.म्हणून शेवटी इतकं म्हणावं वाटतं

     जीवनाला रंग कसा ?

      मानवा तू देशी तसा.

© सुश्री दीप्ति कुलकर्णी

हैदराबाद

मो.नं. ९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “खरेदीचे साइड इफेक्ट…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “खरेदीचे साइड इफेक्ट…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

साइड इफेक्ट बऱ्याचदा औषधांचे, तेलाचे, क्रिमचेच असतात आणि ते नंतर दिसतात किंवा जाणवतात अस काही नाही. त्याचा त्रास ते घेणाऱ्याला होतो हे खरंय. पण लागोपाठच्या आणि सततच्या खरेदीचे सुद्धा साइड इफेक्ट असतात आणि ते आपल्या वागण्यात दिसतात अस लक्षात आल. आणि त्याचा त्रास समोरच्याला होतो.

खरेदी करायला कोणाला आवडत नाही… पण पुरुषांना सगळ्याच खरेदीत तेवढाच उत्साह असतो अस नाही. काही खरेदीत तो असतो… तर काहीवेळा तो आणावा लागतो. बायकांच्या बाबतीत खरेदी म्हणजे नशाच असते. उतरल्याच जाणवतच नाही. खरेदी जेवढी जास्त तेवढी ती चढतच जाते. मग आपली स्वतःची नसली तरीही.

आमच्याकडे एक कार्य होत. मग काय? खरेदीचा सुळसुळाट आणि उत्साहाचा महापूर आला होता. महापुरात सगळीकडे पाणीच पाणी दिसत. तसच या सुळसुळाटात आणि उत्साहात हातात पिशव्या आणि खिशात यादीच सापडत होती. याशिवाय अनेक सुचना होत्या त्या वेगळ्या. कुठे जायच, काय घ्यायच, तिथे काय घ्यायच नाही. भाव किती असेल. भावाच्या बाबतीत तुम्ही बोलू नका. त्यातल तुम्हाला काही कळत नाही. (नाहीतरी कशातल कळतंय….. अस पण हळूच बोलून होत होत.) सामान उचलण्याची घाई करू नका. हल्ली सामान घरपोच देतात. या आणि अनेक. या सुचनांमुळे काहीवेळा सुचेनासे होत.

घरचा माणूस म्हणून जवळपास सगळ्याच ठिकाणी माझी उपस्थिती अगदी प्रार्थनीय नसली तरी हवी होती. निदान गाडी घेऊन तरी चला…….. बाकीच आम्ही पाहून घेऊ. असे सांगत प्रार्थनीय उपस्थिती असणाऱ्यांची सोय झाली होती. गरज होती ती गाडीची आणि त्यांच्या सोयीच्या वेळेत. (याला म्हणतात काॅन्फिडन्स…….)

कार्यासाठी दागिने खरेदी करतांना यातच पण वेगळी डिझाईन, हिच डिझाईन पण वजनाला यापेक्षा थोड कमी किंवा जास्त. थोड लांब किंवा अखूड. दोन पदरी किंवा मोठं पेंडेंट. असा संवाद सारखा कानावर पडत होता. सोनं पिवळंच असल्याने त्यात वेगळा रंग मागायची सोय नव्हती. पण ती रंगाची कमी आम्ही दागिन्यांवर लावलेल्या खड्यांच्या रंगात आणि आकारात उभ्या उभ्या म्हणजे खडेखडेच शोधत होतो. घडणावळ जास्त आहे, हे वाक्य. आणि मधे मधे कॅरेट हा शब्द होताच. रेट मात्र फिक्स होता.

सोन्याच्या दुकानात भाव करण्याची सोय नसते. पण त्या विकणाऱ्याल्याच एक दोन दिवसात भाव काही कमी होण्याची शक्यता आहे काहो?…… अशीही विचारणा होत होती… कमी नाहीच पण वाढण्याची शक्यता आहे….. असे तो चेहऱ्यावरचे भाव न बदलता सांगायचा. त्याच बोलणं मनाला बरं वाटतं होतं. एकतर आज थोड स्वस्त मिळेल याचा आनंद. नाहीतर दोन दिवसांनी याच तिकीटावर हाच खेळ परत करायला लागेल याची काळजी.

इतर खरेदित या रंगात, त्या डिझाईन मध्ये, आणि त्या प्रकारात अशी विचारणा हातरुमाल, पर्स, पिशव्या, साड्या, पॅन्ट आणि शर्ट पिस, चप्पल, बुट अशा शक्य त्या सगळ्या वस्तुंच्या बाबतीत झाली. डिस्काउंट वर घसघशीत घासाघीस झाली.

किराणा मालातील साबण आणि पेस्ट या सारख्या काही वस्तू सोडल्या तर तांदूळ, पोहे, रवा, डोक्याला लावायचे तेल, चहा या सारख्या वस्तू सुद्धा सुटल्या नाहीत. रवा जाड हवा. पोहे जास्त पातळ हवे, किंवा नको. वेगवेगळ्या नावाचे पण पोहे असतात हे मला याचवेळी समजले. चहा मिक्स हवा, ममरी नको, हे माझ्या मेमरीत फिट्ट बसले. तांदूळ बासमतीच हवा, चिनोर, कोलम नको. तुकडा चालणार नाही. असं पाहतांना एक एक वस्तू आणि त्यांची खरेदी याचा तुकडा पाडला जात होता. म्हणजे खरेदी संपत नसली तरी काही प्रमाणात आटोपत होती.

त्यामुळे प्रकार, रंग, डिझाईन, भाव, डिस्काउंट या गोष्टी त्या काही दिवसात पाठ झाल्या होत्या. पाठ म्हणजे इतक्या पाठ की त्या पाठ सोडायला तयार नव्हत्या.

पण या सगळ्या खरेदीचा साइड इफेक्ट कार्य संपल्यावर जाणवला. नंतर परत बॅंकेतून पैसे काढण्यासाठी गेलो तेव्हा कॅशीयरला सुध्दा सांगितले. सगळ्या एकाच प्रकारच्या नोटा देऊ नका. वेगवेगळ्या द्या.  त्यावर त्याने सुद्धा विचारले. काही कार्यक्रम आहे का?… हे झाले पैशाचे.

सलून मध्ये पण असंच झालं. कटिंग करायला बसल्यावर त्याने विचारले. कसे कापू? जास्त की साधारण?…..  मी विचारल पैसे दोघांचे सारखेच लागतील नं? त्यावर त्याने ज्या नजरेने माझ्याकडे पाहिल ते त्याच्या आरशात मला दिसल…..

कार्याची दगदग झाल्यावर नंतर तब्येत थोडी नरमगरम वाटली. डाॅक्टरांकडे गेलो. त्यांनी तपासून तीनचार गोळ्या व एक बटलीतले औषध लिहून दिले.

औषधाच्या दुकानात तोच प्रकार. अरे या पॅकिंगमध्ये गोळ्या कशा आहेत ते दिसत नाही. जरा आकार आणि रंग दिसणाऱ्या दाखवा ना…… बाटलीत यापेक्षा वेगळा आणि लहान आकाराच्या नाही का?… किमतीत काही कमी जास्त…… गोळ्या यातच लहान नाही का?…. गिळायला बऱ्या असतात.

मी अस विचारल्यावर औषध विकणाऱ्याने चेहरा खाऊ का गिळू असा केला. पण साइडने त्याच्या चेहऱ्यावर माझ्या बोलण्याचा झालेला इफेक्ट मला दिसलाच…..

माझ्या लक्षात आलं. सतत रंग, डिझाईन, वजन, लहान, मोठ अस विचारत  केलेल्या सततच्या खरेदीचा हा साइड इफेक्ट आहे……

असच एक कार्य बऱ्याच वर्षांपूर्वी माझ्याचसाठी घडवून आणल होत. त्याही कार्याचे काही साईड आणि वाईड इफेक्ट आता दिसायला लागले आहेत. पण त्यावर नंतर बोलू.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares