मराठी साहित्य – विविधा ☆ “निर्व्याज…” ☆ सुश्री धनश्री लेले ☆

? विविधा ?

☆ “निर्व्याज…” ☆ सुश्री धनश्री लेले ☆

रत्नागिरीला एका कार्यक्रमासाठी गेले होते, पावसाळ्याचे दिवस होते. तुफान पाऊस पडत होता. कार्यक्रम रात्री ९ चा होता. संध्याकाळी ७ नंतर आवरायला घेतलं, एवढय़ात दार वाजलं. आत्ता कोण? अशा प्रश्नांकित चेहऱ्यानेच मी दार उघडलं. एक पासष्टीच्या काकू उभ्या होत्या.

‘‘धनश्री लेले तुम्हीच ना?’’

मी म्हटलं, ‘‘हो. या ना आत.’’

त्या आत आल्या. बऱ्याचशा भिजल्या होत्या. दोन हातांत दोन मोठय़ा पिशव्या होत्या. त्या बसल्या. मनात आलं, ‘आवरायचं आहे, साडेसातपर्यंत थिएटरला पोहोचायचंय, आता किती वेळ जाणार आहे काय माहीत.’  माझ्या मनातला हा प्रश्न समजून घेऊनच जणू त्या म्हणाल्या, ‘‘अगं, तुझा वेळ नाही घेत. खरंतर बसतही नाही, पण जिने चढून आले ना, थोडी धाप लागली म्हणून बसले.’’

‘‘छे छे बसा की. माझं होईल वेळेत आवरून..’’ मी असं म्हटलं होतं खरं.. पण या कोण काकू? आणि यांचं माझ्याकडे नेमकं काय काम आहे? हा पुढचा प्रश्न मनात उभा. जणू त्यांना तोही कळला. म्हणाल्या, ‘‘तू मला ओळखणार नाहीस म्हणजे गरजच नाही ओळखण्याची. मी पाध्ये काकू. माझं काही काम नाही हो तुझ्याकडे. सहज तू रत्नागिरीत येणार आहेस कळलं म्हणून तुला भेटायला आले.’’

‘‘इथेच असता का तुम्ही?,’’ मी विचारलं.

‘‘नाही इथे माझी मुलगा-मुलगी असतात, पण मी राजापूरजवळ भू गावात राहते. महाराष्ट्रातलं एकाक्षरी एकच गाव भू..’’ त्यांनी माहिती पुरवली. ‘‘काकू तुम्ही शिक्षिका होतात का?’’ असं अगदी ओठावर आलं होतं. पण नाही विचारलं.

‘‘काकू तुम्ही मला कसं ओळखता? मी काही टीव्हीवर वगैरे नसते त्यामुळे इतक्या आत भूपर्यंत माझ्याबद्दल कसं कळलं?’’ अगदी सहज ओघात विचारलं.

‘‘अगं, मागे तुझ्यावर चिटणीस सरांनी एका पुस्तकात लेख लिहिला होता, ते पुस्तक वाचलं होतं.. आम्ही tv नाही गं जास्त बघत. हां पुस्तकं वाचतो. तर ते पुस्तक वाचल्यापासून तुला भेटायची इच्छा होती मनात.. आज वृत्तपत्रामध्ये तुमच्या कार्यक्रमाची जाहिरात बघितली नि आले..’’

‘‘अहो, पण एवढय़ा पावसात?’’

‘‘अगं, पावसाचं काय? आमच्या कोकणाचा जावईच तो.. पडायचाच.. एस.टी. असते ना संध्याकाळची.. मग निघाले. दीड-दोन तास लागतात भू गावातून यायला..’’ काकू म्हणाल्या.

‘‘बसा, चहा सांगते तुम्हाला.’’

‘‘अगो छे, तुझं आवर तू.. तुला या पिशव्या दिल्या की मी निघाले..’’ असं म्हणून काकूंनी त्या मोठय़ा दोन पिशव्या माझ्या हातात दिल्या..

‘‘काय आहे यात?’’

‘‘काही नाही गो, आम्ही कोकणातले लोक काय देणार? पानाची डावी बाजू आहे..’’, काकू म्हणाल्या.

‘‘म्हणजे?’’ मी चक्रावून विचारलं.

‘‘अगं, त्या पुस्तकातून कळलं की तुझे बाहेर खूप दौरे असतात, बराच प्रवास करतेस.. घरात रोजच्या कामालाही वेळ होत नसेल मग डाव्या बाजूच्या गोष्टी काय करणार तुम्ही मुली? म्हणून आंब्याचं, आमोशीचं लोणचं. सांडगी मिरच्या, मेतकूट, दोन-तीन प्रकारचे मुरंबे, दोन-तीन प्रकारच्या कोरडय़ा चटण्या, खाराची मिरची, आंब्याची साठं, कुळथाचं पीठ असं थोडं थोडं घेऊन आलीय..’’

थोडं थोडं? बाप रे.. मला पिशव्या उचलवत नव्हत्या.. आणि या काकू एस.टी.ने पावसात एवढय़ा जड पिशव्या घेऊन आल्या..

‘‘अगं, डावी बाजू अशी तयार असली ना की पोळी पटकन खाता येते मुलांना.. पोळीशी काय? हा प्रश्न राहत नाही.. तूही रात्री यायला उशीरबिशीर झाला तर पोळीबरोबर हे खा हो..’’

भरल्या डोळ्यांनी, नि:शब्द होऊन मी एकदा काकूंकडे आणि एकदा त्या पिशव्यांकडे पाहत उभी होते.. पिशव्या खाली ठेवल्या आणि काकूंना मिठी मारली..

कोण होते मी त्यांची? काय नातं होतं आमचं? घरची माणसंही कदाचित हा विचार करणार नाहीत मग काहीशे किलोमीटर लांब राहणाऱ्या काकूंनी एवढा विचार का करावा? स्वत:ला होणाऱ्या त्रासाचा विचारही न करता केवळ मला हे सगळं देता यावं म्हणून एवढय़ा लांब आल्या त्या? काय बोलू?

शब्दापेक्षा कृती नेहमीच मोठी असते हे शब्दांना कळलं असावं म्हणून शब्द खूप आत दडून बसले असावेत.. धन्यवादाचा एक शब्द मी उच्चारू शकले नाही.. ‘धन्यवाद.. थॅंक्यू..’ या शब्दांना इथे काय मोल होतं? नाही म्हणायला एकच शब्द मनात उभा होता. निर्व्याज.. खरंच निर्व्याज.. काय मिळवायचं होतं त्यांना?

‘‘जाऊ  दे, आपल्याला काय करायचंय, बघतील त्याचं ते..’’ अशी वृत्ती अवतीभोवती सतत दिसत असताना .. गेल्या युगात शोभेल अशी ही निर्व्याज वृत्ती काकूंनी कशी काय सांभाळली? खरंच! माझा काय फायदा? मला काय मिळणार आहे? कृती करण्यापूर्वीच हे प्रश्न पडतात सध्या आपल्याला.. सध्या कशाला? दासबोधाची पहिली ओवी.. त्यात ही ‘श्रवण केलियाने काय प्राप्त’ असा सवाल श्रोते विचारतील. श्रवण करण्यापूर्वीच असा विचार समर्थानीही केला. फायद्याशिवाय जन नाही.

पण इथे मात्र संपूर्ण वेगळं चित्र पाहत होते. कोण कुठली दुसरी व्यक्ती. जिचा आपल्याशी दूरान्वयेही संबंध नाही तिचा एवढा विचार करून, तिला आपण थोडं तरी सहकार्य करू या. हा असा विचार म्हणजे रामराज्यच! आपण या गोष्टीला ‘लष्कराच्या भाकऱ्या भाजणे’ अशी रोखठोक म्हण देऊन ठेवलेली आहे. पण लष्करालाही भाकऱ्या लागतात आणि त्या भाजणारेही कोणीतरी असतातच. स्वातंत्र्य दिनाला कमरेएवढय़ा पाण्यात उभं राहून गस्त घालणाऱ्या सैनिकाचा फोटो ..सबसे तेज ..व्हॉट्स अपवर अपलोड करून व्हर्च्युअल अश्रू गाळणारे आपण असं कोणी करत असेल निर्व्याज प्रेम तर लष्कराच्या भाकऱ्या भाजतोय.. असं म्हणून मोकळं होतो.

मनात विचार आला हे असं निर्व्याज वागायला कधी तरी जमणार आहे का आपल्याला? निसर्ग निर्व्याजच वागत असतो.. झाडं स्वत:ची फळं स्वत: खात नाही.. नदी स्वत:चं पाणी स्वत: पीत नाही, गाई स्वत:चं दूध स्वत: पीत नाहीत.. आठवीत संस्कृतमध्ये या आशयाचा श्लोक पाठ केला होता.. त्यात नदी होती, गाय होती, झाडं होती, पण माणूस नव्हता.. कारण तो सुभाषितकार या काकूंना भेटला नव्हता. ‘ऐंशी कळवळ्याची जाति करी लाभाविण प्रीती’ लाभाविण प्रीती.. बाप रे. कल्पनाही सहन होणार नाही आजच्या काळात..

‘‘पुन्हा येशील तेव्हा कळवून ये हो.. म्हणजे छान मोदक वगैरे करून आणीन..’’ काकूंच्या बोलण्याने मी भानावर आले.. ‘‘आणि यातलं काही संपलं आवडलं तर नि:संकोच सांग. पाठवून देईन मुंबईस.’’ मनात आलं म्हणावं, काकू नका आता आणखी काही बोलू. तुमचं हे निर्व्याज प्रेम घ्यायला आमच्या ओंजळी समर्थ नाहीत हो.. ‘तुझमे कोई कमी नही ..मेरी ही झोली तंग है’..’’

काळ्या ढगांनी भरलेल्या आभाळात लख्ख वीज चमकावी आणि तेजाने सगळा आसमंत उजळून निघावा.. तशा त्या कोसळणाऱ्या पावसात आलेल्या काकू मला वाटल्या. एक ज्योत उजळली त्यांनी मनात. आता बाहेरच्या ‘मी, माझा’च्या वाऱ्यापासून तिला जपण्याचं काम करायचं होतं.. खूप कठीण..

© सुश्री धनश्री लेले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “सहज सुचलं म्हणून…” ☆ प्रा.भारती जोगी ☆

? विविधा ?

☆ “सहज सुचल म्हणून…” ☆ प्रा.भारती जोगी ☆

सहज सुचलं म्हणून…….

काही दिवसांपूर्वी श्रीरंग खटावकर याची जन्म वारी या नाटका बद्दल ची पोस्ट वाचनात आली. शीर्षक होतं

आपण ठरवायचे आपण चाळ बनायचे की टाळ……

मनात विचारांची आवर्तनं सुरू झाली.

चाळ आणि टाळ…… दोन्ही नाद ब्रह्मा ची आविष्कृत रूपं! ताल अधिक लय यांची नाद लहरीं ची निर्मिती! दोघांच ही काम लयीत वाजणं, ठेक्यावर झंकारणं!!! पण चाळ बहुधा इतरांच्या मनोरंजना करीता… तर टाळ स्व रंजना करीता… आत्मानंदा साठी!!

चाळ… प्रपंचा साठी पायी बांधण्याचा केलेला प्रपंच! तर टाळ.. परमार्था साठी केलेला प्रपंच!

प्रश्न आहे तो आपण चाळ बनायचे की टाळ???

तसं पाहिलं तर ही दोन्ही भक्ती ची साधने! एक कलेच्या भक्ती चं…. तर एक परमेश्वराच्या भक्ती चं! भक्ती म्हटली की… येते ती.. तल्लीनता, तद्रूपता!! आणि मग बघा ना..

टाळ बोले चिपळीला  नाच माझ्या संग!! म्हणजे… चाळ न बांधता ही तन्मय होऊन नाचणं  आलंच ना?

मीरा बाई चं कृष्ण भक्ती चं मधुरा भक्ती चं रूप बघा …

पग घुंगरू बांध मीरा नाची रे!!

तिनं तिची भक्ती व्यक्त करण्यासाठी,

कृष्णा प्रती चं समर्पण चाळ बनून च तर सिद्ध केले.

एका गाण्याच्या ओळी आठवल्या,

कांटों से खिंचके ये आंचल

तोड के बंधन बांधी पायल

आता बघा…. एक बंधन तोडलयं… सोडवलंयं  त्यातून… पण… परत दुसरं बंधन चाळ बांधले च की पायी!!

मग प्रश्न पडतो की… बंधनातून  मुक्ती नंतर परत बंधन??  तर हो… चाळ बांधणं हे ब्रह्मानंदी टाळी लागून.. मुक्ती प्राप्त करून देणारी अवस्था आहे. त्या तली  तल्लीनता.,. मोक्षप्राप्ती ची वाट मोकळी च करते जणू! सांसारिक बंधनातून मुक्त होऊन परमेश्वराच्या भक्ती त.. नामस्मरणाशी स्वत:ला बांधून घ्यायचं.. दंग होऊन जायचं.. रंगून जायचं.. एकरंग.. एकरूप व्हायचं.

 टाळ हाती घेऊन ही तीच फलप्राप्ती!! कारण टाळ हाती घेऊन

देहभान विसरून नाचणं च तर असतं ना?? नृत्य ही मनातल्या भाव-विभाव-अनुभाव  यांचं प्रकटीकरण!  आत्म्याची परमात्म्याच्या  भेटीला आतुर पावलांनी… पदन्यासातून धरलेली वाटच तर असते ना! आणि टाळ हाती घेऊन झाले ले पदन्यासाचे प्रकटीकरण ही… पंढरीच्या वाटेवरचे रिंगण असो की

किर्तनाचे रंगी नाचे असो….

टाळ बना की चाळ…. …

ही जन्म वारी सुफळ, संपूर्ण व्हावी आणि विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला!!! इतकं सामर्थ्य हवं आपल्या टाळ आणि चाळ दोन्ही च्या नाद लहरीं चं!! यां दोन्ही पैकी कुठलंही रूप हे ईश्वरा शी एकरूपत्व साधणारे नादमय नामस्मरण च आहे!

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चंद्रभागेतीरी… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ चंद्रभागेतीरी… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

आषाढी कार्तिकी भक्तजन येती

(कार्तिकी एकादशी निमित्ताने एक छोटासा लेख)

चंद्रभागेतीरी। भक्तांची ही दाटी।

चालतसे वाटी । पंढरीची ।।

दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला थंडी, वारा, ऊन, पाऊस कशाचीही तमा न बाळगता स्त्रिया, पुरूष, आबालवृद्ध सर्व भक्तगण माथ्यावर तुळस घेऊन आणि मुखाने हरिनाम घेत पंढरीची वाट चालत असतात.

वारी म्हणजे भक्तीचा उत्सव!भक्ताचा परमेश्वराशी संवाद!अनन्यसाधारण भक्ती!

चौर्‍यांशीलक्ष योनीतून फिरत फिरत हा मानवाचा जन्म लाभलेला आहे.आता ओढ लागली आहे ती मोक्षाची.ह्या मोक्षाप्रती जाण्यासाठी एकच मार्ग म्हणजे भक्तीयोग!परमेश्वराला कुठेही शोधत फिरण्याची गरज नाही.तो जीवात्मा आहे.त्या ह्रदयस्थ परमेशाशी एकरूपता होणे म्हणजेच परमेश्वराशी मीलन होणे.

पांडुरंग हा दासांचा दास आहे.आपल्या भक्तांसाठी तो प्रगट होतो व त्याचे रक्षण करतो.म्हणून विठूमाऊलीचे अखंड भजन करावे असे संत तुकाराम त्यांच्या कित्येक अभंगांतून साधकांना सांगत असतात.ते म्हणतात,

दास करी दासांचे । उणे न साहे तयाचे ।

वाढिले ठायीचे । भाणे टाकोनिया द्यावे ।।

ऐसा कृपेचा सागर । विटे उभा कटी कर ।

सर्वस्वे उदार । भक्तालागी प्रगटे ।।

वारीत सहभागी झालेल्या प्रत्येक भक्ताला ही पांडुरंगाच्या भेटीची तळमळ लागून राहीली आहे. विठूच्या दर्शनाच्या ह्या तळमळीने त्यांच्या शरीराला कोणतेही क्लेश जाणवत नाहीत कारण प्रत्यक्ष पांडुरंगानेच त्यांना आश्रय दिला आहे.

साधकाने चिंता कशाची करावी?भार वहाण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वर ठाकला आहे.तेव्हा पांडुरंगाशी समर्पण केले की योगक्षेम  वहाण्यासाठी भगवंत सतत भक्ताच्या पाठीशी उभा आहे.

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जाणता राजा… ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? विविधा ?

☆ जाणता राजा… ☆ श्री राजीव गजानन पुजारी 

छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन करतांना समर्थ रामदास स्वामी म्हणतात,

“निश्चयाचा महामेरू।  बहुत जनांसी आधारू ॥

अखंड स्थितीचा निर्धारू।  श्रीमंत योगी ॥”

समर्थ पुढे म्हणतात,

“यशवंत कीर्तिवंत। समर्थ्यवंत वरदवंत॥

नीतिवंत पुण्यवंत। जाणता राजा॥”

पहिल्या कडव्यातील प्रत्येक चरणामध्ये नीट पाहिले तर महाराज एक शासक व व्यवस्थापक म्हणून कसे होते याचे वर्णन आहे. यातील ‘श्रीमंत योगी’ हा शब्द महत्वाचा आहे. महाराज श्रीमंत असून श्रीमंतीपासून अलिप्त होते. ‘ खजिन्यात जमा झालेली संपत्ती रयतेची आहे ’ यावर महाराजांचा ठाम विश्वास होता, ती संपत्ती त्यांनी फक्त आणि फक्त रयतेच्या कल्याणासाठीच वापरली. हे त्यांच्या व्यवस्थापनाचे महत्वाचे तंत्र होते.

दुसऱ्या कडव्यातील पहिल्या तीन चरणांमध्ये  महाराजांचा गुणगौरव केला आहे. शेवटच्या चरणातील ‘जाणता राजा’ हे शब्द महत्वाचे आहेत. महाराज ‘राजे’ होतेच, पण तो एक ‘जाणता’ राजा होता. जाणता म्हणजे जाणणारा. ज्याला आजूबाजूच्या परिस्थितीची जाण असते व जो प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल कसे बनवायचे हे जाणतो, त्याला ‘ जाणता ‘ म्हटले जाते. महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य अद्वितीय होते. आजदेखील त्यांनी दिलेल्या व्यवस्थापन तंत्रांचा वापर केल्यास आपला देश निश्चितच ‘विश्वगुरु’ होऊ शकतो.

व्यवस्थापनाचा मूलमंत्र म्हणजे ‘दूरदृष्टी’.  आपल्या प्रजेचा जर विकास करायचा असेल तर पारतंत्र्याचे जोखड झुगारून स्वतःचे राज्य –  म्हणजे स्वराज्य निर्माण करावे लागेल हे त्यांनी बालपणीच ओळखले. कारण स्वातंत्र्यातच रयतेचा विकास होतो हे जाणण्याची दूरदृष्टी लहान वयातच त्यांचेकडे होती. या त्यांच्या दूरदृष्टीमुळेच त्यांना ‘आनंदभुवन’ समान स्वराज्याची निर्मिती करता आली.

रयतेसाठी स्वराज्याची निर्मिती करायची तर त्यासाठी ‘कार्याप्रती समर्पित मनुष्यबळ’ हवे. त्यासाठी माणसे ओळखावी लागतात, ओळखलेली माणसे जोडावी लागतात, जोडलेली माणसे संघटित करावी लागतात. एक संघटित शक्ती निर्माण करावी लागते आणि त्यातूनच कोणतेही महान कार्य घडत असते, हे शिवरायांनी ओळखले होते. महाराज रत्नपारखी होते. त्यांचेकडे माणसांतील गुण ओळखण्याचे अलौकिक कौशल्य होते. त्यामुळे त्यांनी येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, जिवा महाला, तानाजी मालुसरे अशी एक नाही अनेक माणसे हेरून त्यांच्या मनात स्वराज्याचे बीज रोवले.

त्यानंतर प्रत्येक सुलतानशाहीस कधी दिशाभूल करून, कधी गहाळ पाडून तर कधी नुसते झुलवत ठेऊन महाराजांनी आपला कार्यभाग साधण्यास सुरुवात केली. आपल्या राजकीय हालचालींचा कोणासही सुगावा लागू न देता अचानक हल्ला करणे, शत्रूस गाफिल ठेऊन त्याचा मुलुख लुटणे इत्यादी कामांत महाराजांची राजनीती दिसून येते. आपल्या शत्रूला आपल्या विरोधात कोणी सहाय्य केले तर, नंतर वेळप्रसंगानुसार त्याचा बदला घेणे हाही महाराजांच्या राजनीतीचा भाग होता. पुरंदरच्या तहाशिवाय इतर कोणताही तह त्यांनी पाळला नाही. त्यांच्या दृष्टीने तह म्हणजे संकटमय परिस्थितीतून सुटका करून घेण्यासाठी एक तात्पुरता इलाज होता. केवळ आपला हेतू साध्य करण्यासाठी महाराज तह करीत असत.

शत्रू जर आपल्यापेक्षा बलाढ्य असेल तर त्याला हरवण्यासाठी महाराजांनी गनिमी काव्याचा वापर केला. ‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ ही उक्ती त्यांनी वारंवार खरी करून दाखवली आणि बेसावध शत्रूला गनिमी काव्याने वारंवार धूळ चाटवली. त्यांच्या ह्या गनिमी काव्याचा युद्धनीती म्हणून आजही जगभरातील सैन्यांद्वारे अभ्यास केला जातो.

जुलूमी परकीय सत्तेला विरोध करत असतानाच महाराजांनी राज्याची आर्थिक घडी व्यवस्थित बसवून आर्थिक स्थैर्य निर्माण केले. शेतीला बिनव्याजी कर्ज देणे, पुरोगामी शेतसारा पद्धत राबविणे, व्यापाराला प्रोत्साहन देणे, पडीक जमिनी लागवडीखाली आणणे, ठिकठिकाणी बाजारपेठा निर्माण करणे या बाबींना प्राधान्य दिले व त्याची अंमलबजावणी केली.

शिवाजी महाराज हे पहिले भारतीय राजे होते, ज्यांनी नौदल किंवा आरमार उभारले. त्यामुळे पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रज या परकीय सत्तांवर दबाव निर्माण झाला व त्यांच्या बरोबरीने समुद्रात सार्वभौमत्व सिद्ध झाले.

महाराजांनी अगदी सुरुवातीपासूनच पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या बाबतीत दक्षता घेतली होती. स्वराज्यात वृक्षतोडीस सक्त मनाई होती. अगदी जुन्या व जीर्ण झालेल्या साग, आंबा व जांभळीच्या लाकडांचाच उपयोग जहाज बांधणीसाठी होत असे. वृक्षांच्या संरक्षणासाठी खास सेवक असत. तुकाराम महाराजांची  ‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे’  ही उक्ती शिवाजी महाराजांनी तंतोतंत अमलात आणली होती.

स्वराज्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्यात पाण्याचा साठा असणे महत्वाचे होते. त्यामुळे पाण्याचे संधारण आणि साठा साधारण वर्षभर पुरेल अशी उपाययोजना महाराजांनी केली होती. म्हणजे चुकून गडावर हल्ला झाला तरी आणीबाणीच्या परिस्थितीतसुद्धा गडावर आवश्यक तेवढा पाणीसाठा कसा राहील ह्याची काळजी घेतली गेली होती. आज आपण जे ‘रेन हार्वेस्टिंग’ म्हणतो त्याचे जनक शिवरायच होत.

शिवाजी महाराजांना कायमच सर्व धर्मांबाबत आदर होता. महाराजांचे अनेक सेवक मुस्लिम होते व ते महाराजांशी अत्यंत एकनिष्ठ होते. स्वराज्यात धर्मावर नाही तर शौर्य, बुद्धी, स्वामीनिष्ठा आदि गुणांवर बढती दिली जात असे. युद्धकाळात इस्लाम धर्माचा धर्मग्रंथ सापडला असताना महाराजांनी त्याचा आदरच केल्याचा उल्लेख आहे.

महाराज प्रत्येक स्त्रीला देवीसमान मानत. कोणत्याही युद्धात महाराज किंवा त्यांचे सैनिक यांचेकडून स्त्रियांना उपद्रव झाला नाही. चोरी व स्त्रीचा अवमान या गोष्टींना कडक शासन केले जात असे. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सेवकांना बक्षीस म्हणून मौल्यवान वस्तू दिल्या जात.

वरील विवेचनावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जाणतेपणामुळे आपणास दिलेली व्यवस्थापन तंत्रे खालील प्रमाणे सांगता येतील :

  • विविध कर आदि प्रकारे देशाच्या खजिन्यात जमा झालेली संपत्ती जनतेची आहे याची जाणीव ठेऊन तिचा विनियोग जनतेच्या सोयी सुविधांसाठी करणे.
  • देशाच्या विकासासंदर्भातील निर्णय दूरदृष्टीने घेणे.
  • कार्याप्रती समर्पित असे मनुष्यबळ प्रशिक्षण व समुपदेशनाद्वारे तयार करणे व त्यांच्यात देशप्रेमाचे बीजारोपण करणे.
  • आपल्या देशाच्या सार्वभौमत्वास सर्वोच्च प्राधान्य देणे व ते टिकविण्यासाठी वेळप्रसंगानुसार कोणताही मार्ग अवलंबणे.
  • शत्रूस गाफिल ठेऊन त्याचेवर चढाई करणे.
  • आपल्या शत्रूस आपल्या विरोधात कोणी सहाय्य केल्यास त्याचा बदला योग्य प्रसंगी घेणे.
  • शत्रुवर आवाजवी भूतदया न दाखविणे.
  • देशाच्या हिताचा विचार सर्वोच्च ठेवणे. त्यासाठी केलेले तह पायदळी तुडवायला मागेपुढे न पाहणे.
  • शत्रू बलाढ्य असेल तर गनिमी काव्याचा अवलंब करून त्याला नेस्तनाबूद करणे
  • देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी कर व इतर मार्गानी मिळालेला पैसा पायाभूत सुविधांमध्ये गुंतविणे जेणेकरून त्यापासून अधिकचे उत्पन्न मिळेल.
  • शिवाजी महाराजांनी काळाचा विचार करून आरमार उभारले. तसेच आपण काळाचा विचार करून नवीन तंत्रज्ञान वापरून भविष्यातील युद्धप्रसंगांसाठी सज्ज असायला हवे. कदाचित भविष्यातील युद्ध अंतराळात लढले जाईल किंवा माहिती-तंत्रज्ञानाधारित असेल.
  • पायाभूत सुविधा निर्माण करतांना पर्यावरणाचे भान ठेवणे.
  • पाण्याचे योग्य नियोजन करणे.
  • सर्व धर्मांचा आदर ठेवणे.
  • स्त्रियांचा आदर करणे. तो न करणाऱ्यास कडक शासन करणे.
  • चोरी व फितूरीस कडक शिक्षा ठोठावणे, व त्याची अंमलबजावणी त्वरित करणे.

महाराजांनी दिलेली वरील व्यवस्थापनाची तंत्रे आजच्या काळातही तितकीच लागू पडतात, त्यांचा वापर केल्यास आणि त्यामागील त्यांचे ‘ जाणतेपण ‘ शिकण्याचा प्रयत्न केल्यास– नव्हे त्याचा ध्यास घेतल्यास , भविष्यात आपला देश महासत्ता होईल यात शंका नाही.

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “अंक, आकडा…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “अंक, आकडा…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

अंक किंवा आकडा यांचा व माझा प्रत्यक्ष संबंध शाळेपासून आला असला तरीही सुरुवात झाली ती मात्र जन्मापासूनच.  कशी ते शेवटी सांगेनच.

आपल्याकडे जसे काही देवांना अनेक नांवे आहेत ना तसेच अंकांचे देखील आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हे वेळ या नावाने फिरत असतात.

कॅलेंडरवर ते तारीख म्हणून विराजमान असतात. तारीख म्हणून ते ठसठशीत असतात. पण या तारखेच्या चौकोनातच बाजूला कुठेतरी बारीक अक्षरात कृ. म्हणजे कृष्ण आणि शु. म्हणजे शुक्ल पक्ष असे एक ते चौदा पर्यंत असतात. तेव्हा ते तिथी या स्थितीत असतात. 

रेल्वे, विमान, बस, नाट्य आणि चित्रपट गृहात, तसेच परिक्षेच्या वर्गात ते सीट नंबर असतात. तर वर्गात रोल नंबर म्हणून परिचित असतात. 

काहीवेळा त्यांचा नंबर असा उल्लेख होतो. मग तो नंबर चष्म्याचा, फोनचा, परिक्षेचा, गाडीचा, अगदी बॅंकेचा अकाउंट नंबर ते आधार कार्ड वरचा असा कशाचाही असू शकतो. थोडक्यात आकडे आपला आधार आहेत.

परिक्षेत मिळालेले गुण असतात. तर पत्रिकेत देखील गुणच असतात. पण परिक्षेत मिळवावे लागतात आणि पत्रिकेत ते जुळावे लागतात.

कोणत्याही खरेदी केलेल्या वस्तू बद्दल कागदावर ते मांडले गेले की त्यांचे बिल होते. शींप्याने कागदावर लिहीली तर मापे, आणि  घराच्या संदर्भात देखील मापेच असतात, पण घरांच्या बाबतीत त्यांना कार्पोरेट फिल येतो आणि ते कार्पेट एरिया म्हणून ओळखले जातात.

एकाच माणसाचे वेगवेगळ्या व्यक्तींसोबत वेगवेगळे नाते आणि त्या नात्याची किंमत असते. तसेच यांनी देखील एकक, दशक, शतक असे स्थान बदलले की यांची किंमत बदलते.

हल्ली मोठे आकडे सुध्दा लहान स्वरूपात सांगतात. जसे घराची किंमत १ किंवा १.५ CR. असे. लहानपणी देखील आम्हाला CR. आणि WR. असे ठाऊक होते. पण ते सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वे असेच होते. नंतर काॅलेजमध्ये CR शी संबंध आला पण पैशातील CR चा संबंध अलीकडच्या काळातील आहे.

हे आकडे सरळ आले असते तर चालले असते. पण त्यात परत बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे आले. सोबत सरासरी आणि टक्केवारी देखील आणली. इथेच थांबले नाहीत. पूर्णांक, अपूर्णांक असे भाऊबंद घेऊन येतांना सम, विषम, मुळसंख्या अशा लवाजम्यासह आले.

कामाच्या बदल्यात पदरी पडलेले आकडे पगार असतात. यात देखील ते ढोबळ आणि निव्वळ असे वेगवेगळे असतात. 

शुभ, अशुभ असे आपणच यात केले आहे. तेरा अशुभ, तर एकमेकांशी पटत नसले तर छत्तीस चा आकडा हे यांच्या बाबतीत आपणच ठरवले.

हे वजन आणि उंची देखील सांगतात. वजनाने घेतलेल्या गोष्टी ग्रॅम, लिटर मध्ये तर अंतराच्या भाषेत फर्लांग, मैल, किलोमीटर मध्ये, आणि उंची फुटात, इंचात, सेंटिमीटर मध्ये सांगतात.

आकडे हे गणित घालतात. निवडणुकांमध्ये देखील हे आकड्यांचे गणित जमवावे आणि सोडवावे लागते.

नुकत्याच जाहीर झालेल्या परिक्षेच्या निकालाचे पहा. सगळे आकड्यातच होते. एकूण परिक्षेला बसलेले किती? पास झालेले किती? मुले किती? मुली किती? मुले आणि मुली यांचे प्रमाण आणि पास होण्याचे प्रमाण किती?

या शिवाय वाणिज्य, विज्ञान, कला यात किती? आणि विभागवार पुणे, कोल्हापूर, कोकण, मराठवाडा, विदर्भ इ….. सगळे एकूण आणि टक्केवारीसह पण आकड्यातच.

सगळे आकडे दिसणारे, समजणारे असतात. पण काही आकडे वेगळे असतात. हे साधारण लटकवायला किंवा विद्युत तारांवर टाकतात. आकड्यात वैध आणि अवैध आकडे आहेत का माहित नाही. पण विद्युत तारांवर टाकलेले आकडे अवैध असतात असे म्हणतात.

माझी आजी अंबाडा घालतांना आकडे वापरायची. पण त्यात मला कोणताही आकडा किंवा आकड्यासारखा आकार दिसलाच नाही.

ग्रामीण भागात काही लोकं आकडी आली असे म्हणतात. पण आकड्यांचे हे स्त्रीलिंगी रूप मला नीट समजलेले नाही.

हत्तीच्या बाबतीत जसे त्याचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात असे म्हणतात. तसेच काही ठिकाणी कागदावरचे आणि प्रत्यक्षातले आकडे वेगळे असतात असे ऐकले आहे. पण असतात ते आकडेच.

आकड्यांची सोबत जन्मापासून झाली ते कसे हे सांगतो. माझा जन्म झाल्यावर तारीख, महिना, वर्ष इतकेच काय वेळेसह  ते नोंदले गेले तरी ते सगळे आकडेच, अंकच आहेत. आणि मी गेल्यावरही ते नोंदवले गेले तरीही आकडेच राहणार आहेत.

असे हे आकडे विमा कंपनीच्या जाहिराती सारखे “जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी|” सोबत असणार आहेत.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “सगळेच फुकट? का?”… लेखक – श्री अनिल शिंदे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? विविधा ?

☆ “सगळेच फुकट? का?”- लेखक – श्री अनिल शिंदे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

आज बालवाडीपासूनच फुकटचा भात, अंडी, शिरा देउन बालमनापासूनच लाचारीची सुरुवात होते व पुढे तरूणपणी दहा रुपयांत जेवण, १०० यूनिट्स मोफत, वीज फुकट, रेशन सरसकट, आवास योजनेंतर्गत निरर्थक सूट, ऊठसूठ कर्जमाफी ह्या गोष्टींची आशा लावून सध्याच्या आणि पूर्वीच्याही सरकारने आणू घातलेल्या या योजना समाजाच्या मानसिकतेवर अतिशय घातक परिणाम करून जाणार आहेत.

देशात सध्या जवळपास ६७% लोकसंख्या तरुणांची हीच अवस्था आहे, हेच प्रमाण संपूर्ण महाराष्ट्रात आहे.

ज्या वयात आपले भविष्य घडवण्यासाठी कष्ट करायला हवेत, त्या वयातल्या तरुणाला महिना ६०० रुपये दिले की जेवण, मोफत वीज, सरसकट कर्जमाफी दिली जाते. अशाने त्यांची विधायक क्रयशक्ती संपून जाणार आहे.

यामध्ये अजून एक भयंकर गोष्ट म्हणजे अशी की गेल्या १० वर्षापासून इ. १ ली ते ८ वी पर्यंत परिक्षाच झालेली नाहीये. ९ वी साठी ही वर्गोन्नतीचे अलिखीत आदेश आहेत. त्यामुळे यापुढे तरुण पिढीचा भविष्यकाळ खूप कठीण असणार आहे.

ग्रामीण भाग असो किंवा शहरातील चौक, बहुतांश ठिकाणी महागड़े Mobile, Bike, तोंडात गुटखा, अशी ही बहुतांश तरुणाई पार PM कसा चुकीचा, CM कसा चुकतो पासून गावातल्या फ्लेक्सवर आपला फोटो कोणत्या पोजमध्ये टाकायचा यासारख्या चर्चेत गुंतलेला असते….. आता हीच तरुणाई या फुकटचे दान वाटणाऱ्या राजकीय पक्षांच्या सतरंज्या उचलायला सहज उपलब्ध होते….. फुकट जेवण, फुकट वीज, थोडासा बेरोजगार भत्ता, फुकट रेशन यामुळे एक अख्खी कर्तृत्ववान पिढी बरबाद होणार आहे.

आजच्या तरुणाकडे आशिष्ठः, द्रढिष्ठाः, बलिष्ठाः ही सामर्थ्य असायला हवीत, हा तरुण धेयवादी असावा तरच तो या गोष्टींना लाथ मारील व मला फुकटचे नको असे सांगेल.

सगळेच फुकट अशी सवय लागली की पुढच्या सरकारकडून हीच त्यांची अपेक्षा देखील राहणार.

कोणतीही गोष्ट आकाशातून फुकट पड़त नसते, या साठी लागणारा निधी जे ५-६ टक्के करदाते आहेत ते व शेवटी ते शेतकऱ्यांच्या मुळावर महागाईचे रुपात येऊन पडते.

स्विट्झरलंडमध्ये ३-४ वर्षांपूर्वी सर्व नागरिकांना सरकारने तिजोरीत शिल्लक असलेली गलेलट्ठ रक्कम दरमहा फुकट देऊ केली होती. तेव्हा ७७% लोकांनी आम्हाला फुकटचा पैसा नकों, आमची क्रयशक्ती कमी होईल असे सांगून याला विरोध केला. आपल्याला स्विट्झरलंडची सौंदर्य, सुबत्ता दिसते, पण त्या मागे प्रत्येक नागरिकाची जिद्द कर्तव्यनिष्ठता आपण विसरतो.

आपल्याला जर खरंच स्वतःला आणि भारत देशाला संपन्न करून प्रगतिपथावर न्यायचे असेल तर ‘ सगळेच फुकट ‘ ही मानसिकता सोडा आणि अशी अफू देणाऱ्या व्यवस्थेला दूर करण्याचा निश्चय मी आज मनापासून करेन. सरकारनेही जीवनावश्यक वस्तू रास्त भावात द्यायलाच हव्यात.

अन्न फुकट पाहीजे, ते खाण्यासाठी पैसे नाहीत, ते सरकारने द्यावे. किमान आपण राहत असलेल्या आपल्या घराचे १०० Units चे लाईट बिल तरी भरायला हवे, ते भरण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत, ते सुद्धा सरकारने भरावे, मग आपण जन्म कशासाठी घेतला आहे? आपल्यापेक्षा मग पशु-पक्षी बरे, लाॕकडाऊनमध्ये प्राणी-पक्षांना सरकारने काय मोफत दिले? तरी त्यांनी चारा शोधलाच ना! ते जीवन जगलेच ना.

आणि आपण मनुष्य जन्माला आलो आहोत कशासाठी? अशी अवस्था आज आपल्या देशात आहे, इतर देशात कुठेही नाही.

मोबाईल, राजकारण, अतिरंजित मीडिया, जात या विळख्यातून मुक्त होण्यासाठी धड़पडणाऱ्या तरुणाईला ही फुकटची अफू निर्बल निष्क्रिय करण्याचा धोका होतो…

… आणि मग यातूनच मग आपल्या संतानी म्हटल्याप्रमाणे ‘ रिकामे मन, सैतानाचे घर ‘ यानुसार दुराचार बलात्कार, व्याभिचार, लुटमार वाढतात व राष्ट्राचे प्रगतीऐवजी यातून नुकसानच जास्त होते.

*आत्ताचे आपल्या पिढीचे सोडा हो! पण आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीचा सगळ्यांनी नक्कीच विचार करा!”

लेखक : श्री अनिल शिंदे 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महाकवी कालिदास दिन- (आषाढस्य प्रथम दिवसे!) – भाग-2 ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

☆ महाकवी कालिदास दिन- (आषाढस्य प्रथम दिवसे!) – भाग -2 ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(मग रामगिरीहून, जिथे सीतेची स्नानकुंडे आहेत, अशा पवित्र ठिकाणाहून अश्रु भरलेल्या नयनांनी यक्ष मेघापाशी निरोप देतो ! मित्रांनो आता बघू या तो सुंदर श्लोक !) इथून पुढे —-

तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्त: स कामी,

नीत्वा मासान्कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठ: ।

आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्टसानुं,

वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ।

— अर्थात, आपल्या प्रिय पत्नीच्या वियोगाने दग्ध झालेल्या पीडित व अत्यंत व्यथित असल्यामुळे यक्षाच्या मणिबंधातील (मनगटातील) सुवर्णकंकण, तो देहाने क्षीण झाल्यामुळे शिथिल (ढिले) होऊन भूमीवर पडल्यामुळे, त्याचे मणिबंध सुने सुने दिसत होते! आषाढाच्या प्रथम दिनी त्याच्या दृष्टीस पडला तो एक कृष्णवर्णी मेघ! तो रामगिरी पर्वताच्या शिखराला कवेत घेऊन क्रीडा करीत होता, जणू एखादा हत्ती मातीच्या ढिगाऱ्याची माती उपटण्याचा खेळ करीत असतो. 

कालिदास स्मारक, रामटेक 

प्रिय मित्रांनो, हाच तो श्लोकातील जणू काही काव्यप्रतिभेचा तीन अक्षरी बीजमंत्र “आषाढस्य प्रथम दिवसे”! या मंत्राचे प्रणेते कालिदास यांच्या स्मृतीस अभिवादन करून प्रत्येक वर्षी आपण आषाढ महिन्याच्या प्रथम दिनी (आषाढ शुक्ल प्रतिपदा) कालिदास दिन साजरा करतो. ज्या रामगिरी (आत्ताचे रामटेक) पर्वतावर कालिदासांना हे काव्य स्फुरले, त्याच कालिदासांच्या स्मारकाला लोक भेट देतात, अखिल भारतात याच दिनी कालिदासमहोत्सव साजरा केल्या जातो! मंडळी, आपल्याला अभिमान वाटेल, असे महाराष्ट्रातील प्रथम कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक येथे स्थापन झाले. यंदा कालिदास दिन आहे १९ जूनला.

मित्रांनो, आधी सांगितल्याप्रमाणे यक्षाला आषाढाच्या प्रथम दिनी पर्वतशिखरांना लिप्त करून आलिंगन देणारा मेघ, क्रीडा करणाऱ्या प्रेक्षणीय हत्तीप्रमाणे दिसला. १२१ श्लोक (पूर्वार्ध म्हणजे पूर्वमेघ ६६ श्लोक आणि उत्तरार्ध म्हणजे उत्तरमेघ ५५ श्लोक) असलेले हे सकल खंडकाव्य फक्त आणि फक्त एकच वृत्त, मंदाक्रांता वृत्तात (ह्या वृत्ताचे प्रणेते स्वतः कालिदासच!) गेय काव्यात छंदबद्ध करणे ही प्रतिभा (आणि प्रतिमा नव्हे तर प्रत्यक्षात) केवळ आणि केवळ कालिदासांचीच!      

यक्ष आकाशातील मेघालाच आपला सखा समजून दूत बनवतो, त्याला रामगिरी ते अलकापुरीचा मार्ग सांगतो, आपल्या प्रियतमेचे विरहाने झालेले क्षतिग्रस्त शरीर इत्यादीचे वर्णन करून, मेघाला आपला संदेश त्याच्या प्रियतमेपर्यंत पोचवण्याची काकुळतेने विनंती करतो! मंडळी, यक्ष आहे जमिनीवर, पण पूर्वमेघात तो मेघाला प्रियतमेच्या अलकानगरीपर्यंत जाण्याचा मार्ग सांगतो, यात ९ प्रदेश, ६६ नगर, ८ पर्वत आणि १० नद्यांचे भौगोलिक असूनही विहंगम अन रमणीय वर्णन आले आहे. विदर्भातील रामगिरी येथून या मेघदूताचा हिमालयाच्या कुशीत वसलेल्या अलकानगरीपर्यंतचा प्रदीर्घ प्रवास यात वर्णन केला आहे. शेवटी कैलासाच्या कुशीत वसलेल्या अलकानगरीत मेघ पोचतो. या वर्णनात मेघाची प्रियतमा विद्युल्लता आपल्याला भेटते. उत्तर मेघ हा यक्षाने प्रेयसीला दिलेला संदेश आहे. प्रियेने विरहव्याधीमुळे प्राणत्याग करू नये आणि धीर धरावा, असा संदेश तो यक्ष मेघाकरवी पाठवतो. तिला तो मेघाद्वारे संदेश देतोय “आता शाप समाप्त व्हायला अवघे चार मासच उरले आहेत, मी कार्तिक मासात येतोच आहे”. काव्याच्या अंतिम श्लोकात हा यक्ष मेघाला म्हणतो, “तुझा मात्र तुझ्या प्रिय विद्युलतेशी कधीही वियोग न घडो!” असे हे यक्षाचे विरहगान आहे.  

मित्रांनो! स्टोरी काही विशेष नाही, आपण अरसिक पत्र लिहितो तेव्हा पोस्टल ऍड्रेस लिहितो, आत ख्यालीखुशालीच्या ४ ओळी! पण ऍड्रेस बिनचूक, विस्तृत अन आतला मजकूर रोमँटिक असल्यामुळे पोस्टखात्याला भावेल असा असेल तर मग पोस्टखाते पोस्टाचे तिकीट काढून त्या लेखकाला सन्मानित करेल की नाही! खालील पोस्टाचे सुंदर तिकीट हे कालिदासांच्या ऍड्रेस लिहिण्याच्या कौशल्याला केलेला दंडवतच समजा! या काळात कालिदास असते तर, तेच निर्विवादपणे या खात्याचे Brand Ambassador  राहिले असते! कालिदासांनी आपल्या अद्वितीय दूतकाव्यात दूत म्हणून अत्यंत विचारपूर्वक आषाढातील निर्जीव पण बाष्पयुक्त धूसर वर्णाच्या मेघाची निवड केलीय, कारण हा जलयुक्त मेघसखा रामगिरी ते अलकापुरी हा दीर्घ प्रवास करू शकेल याची त्याला खात्री आहे! शरदऋतूत मेघ रिताच असतो, शिवाय आषाढ महिन्यात संदेश पाठवला तर तो त्याच्या प्रियेपर्यंत शीघ्र पोचेल असे यक्षाला वाटले असावे!

(“आषाढस्य प्रथम दिवसे”- प्रहर वोरा, आलाप देसाई “सूर वर्षा”)

मंडळी, आषाढ मासाचा प्रथम दिन आणि कृष्णवर्णी, श्यामलतनु, जलनिधीने परिपूर्ण असा मेघ होतो संदेशदूत! पत्ता सांगणे आणि संदेश पोचवणे, बस, इतकीच शॉर्ट अँड स्वीट स्टोरी, पण कालिदासांचा परीसस्पर्श लाभला व हा आषाढमेघ अमर दूत झाला! रामगिरी ते अलकानगरी, मध्ये हॉल्ट उज्जयिनी (वाट वाकडी करून, कारण उज्जयिनी ही कालिदासांची अतिप्रिय रम्य नगरी!) असा मेघाला कसा प्रवास करावा लागेल, वाटेत कुठले माईल स्टोन्स असतील, त्याची विरहव्याकूळ पत्नी (अन मेघाची भावजय बरं का, no confusion!) दुःखात विव्हळ होऊन कशी अश्रुपात करीत असेल हे तो यक्ष मेघाला उत्कट आणि भावमधूर काव्यात सांगतोय! यानंतर संस्कृत साहित्यात दूतकाव्यांची जणू फॅशनच आली (त्यातील महत्वाचे म्हणजे नल-दमयंतीचे आख्यान), पण मेघदूत हा “या सम हाच” राहिला! प्रेमभावनांचा इंद्रधनुषी आविष्कार असणारे, वाचकाला यक्षाच्या विरहव्यथेत व्याकुळ करणारेच नाही तर आपल्या काव्यप्रतिभेने मंत्रमुग्ध करणारे “मेघदूत!’ म्हणूनच आषाढ मासाच्या प्रथम दिनी या काव्याचे आणि त्याच्या निर्मात्याचे स्मरण करणे अपरिहार्यच!

प्रिय वाचकांनो, आता कालिदासांच्या महान सप्त रचनांचा अत्यल्प परिचय करून देते! या साहित्यात ऋतुसंहार, कुमारसंभवम्, रघुवंशम् व मेघदूत या चार काव्यरचना आहेत, तसेच मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय व अभिज्ञान शाकुंतलम् या संस्कृतमधील तीन नाटक-वजा-महाकाव्ये आहेत!  

आचार्य विश्वनाथ म्हणतात “वाक्यं रसात्मकं काव्यम्” अर्थात रसयुक्त वाक्य म्हणजेच काव्य!

कालिदासांच्या काव्यरचना आहेत निव्वळ चार! (संख्या मोजायला एका हाताची बोटे पुरेत! 

रघुवंशम् (महाकाव्य)

हे महाकाव्य कालिदासांची सर्वोत्कृष्ट काव्यरचना मानली जाते! यात १९ सर्ग असून सूर्यवंशी राजांच्या दैदिप्यमान वंशावलीचे यात तेजस्वी वर्णन आहे. या वंशातील अनेक राजांचे, मुख्यतः  दिलीप, रघु, अज आणि दशरथ यांचे चरित्र  या महाकाव्यात चित्रित केले गेले आहे! सूर्यवंशी राजा दिलीपपासून तर श्रीराम आणि त्यांचे वंशज असे हे या काव्यातील अनेक नायक आहेत.

कुमारसंभवम् (महाकाव्य)

हे आहे कालिदासांचे प्रसिद्ध महाकाव्य! यात शिवपार्वती विवाह, कुमार कार्तिकेयाचा जन्म आणि त्याच्या द्वारे तारकासुराचा वध या प्रमुख कथा आहेत.

मेघदूत (खंडकाव्य)

या दूतकाव्याविषयी मी आधीच लिहिले आहे. 

ऋतुसंहार (खंडकाव्य)

ही कालिदासांची सर्वप्रथम रचना आहे, या गेयकाव्यात सहा सर्ग आहेत, ज्यांत षडऋतूंचे (ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर आणि वसंत) वर्णन आहे.

कालिदासांच्या नाट्यरचना आहेत निव्वळ तीन! (संख्या मोजायला एका हाताची बोटे पुरेत!)     

अभिज्ञानशाकुन्तलम् (नाटक)

या नाटकाविषयी काय म्हटले आहे बघा,”काव्येषु नाटकं रम्यं तत्र रम्या शकुन्तला” (कवितेच्या विविध रूपांत जर कुठले नाटक असेल, तर नाटकातील सर्वात अनुपमेय रम्य नाटक म्हणजे अभिज्ञानशाकुन्तलम्). महाकवी कालिदासांचे हे नाटक सर्वपरिचित आणि सुप्रसिद्ध आहे. महाभारताच्या आदिपर्वात वर्णित शकुंतलेच्या जीवनावर आधारित संस्कृत साहित्यातील सर्वश्रेष्ठ नाटक म्हणजे अभिज्ञानशाकुन्तलम्!

विक्रमोर्यवशियम् (नाटक)

महान कवी कालिदासांचे हे एक रोमांचक, रहस्यमय आणि चित्तथरारक कथानक असलेले ५ अंकी नाटक! यात कालिदासांनी राजा पुरुरवा आणि अप्सरा उर्वशी यांच्या प्रेमसंबंधाचे काव्यात्मक वर्णन केले आहे.

मालविकाग्निमित्र (नाटक)

कवी कालिदासांचे हे नाटक शुंगवंशाचा राजा अग्निमित्र आणि एका सेवकाची कन्या मालविका यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. ही कालिदासांची प्रथम नाट्यकृती होय!

तर मैत्रांनो, ‘कालिदास दिना’ निमित्त या महान कविराजाला माझा पुनश्च साष्टांग प्रणिपात !

प्रणाम आणि धन्यवाद !     

— समाप्त — 

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११

(टीप :  लेखात दिलेली माहिती लेखिकेचे आत्मानुभव आणि इंटरनेट वर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे.)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महाकवी कालिदास दिन- (आषाढस्य प्रथम दिवसे!) – भाग-1 ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

☆ महाकवी कालिदास दिन- (आषाढस्य प्रथम दिवसे!) – भाग – 1 ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

नमस्कार प्रिय मैत्रांनो !

आज १९ जून २०२३, आजची तिथी आषाढ शुद्ध प्रतिपदा, अर्थात आषाढ महिन्याचा पहिला दिवस. आजचा दिवस साहित्य प्रेमींसाठी सुवर्ण दिन, कारण या दिवशी आपण साजरा करतो ‘कालिदास दिन’. मैत्रांनो, हा त्यांचा जन्मदिन अथवा स्मृती दिन नव्हे, कारण ते दिवस आपल्याला माहीतच नाहीत. मात्र त्यांची काव्यप्रतिभा एवढी उत्तुंग आहे की, आपण हा दिवस त्यांच्याच एक अजरामर खंडकाव्यातून शोधला आहे. कालिदास, संस्कृत भाषेचे महान सर्वश्रेष्ठ कवी आणि नाटककार! दुसऱ्या-पाचव्या शताब्दीतील गुप्त साम्राज्यकाळातील अनुपमेय साहित्यकार म्हणून त्यांना गौरवान्वित केलेले आहे. त्यांच्या काव्यप्रतिभेला अनुसरून त्यांना दिलेली “कविकुलगुरु” ही उपाधी स्वतःच अलंकृत आणि धन्य झाली आहे! संस्कृत साहित्याच्या रत्नमालेत त्यांचे साहित्य या मालेच्या मध्यभागी चमकत्या कौस्तुभ मण्याप्रमाणे जाणवते! पाश्चात्य आणि भारतीय, प्राचीन आणि अर्वाचीन विद्वानांच्या मते कालिदास हे जगन्मान्य, सर्वश्रेष्ठ व एकमेवाद्वितीय असे कवी आहेत! या साक्षात सरस्वतीपुत्राच्या बहुमुखी व बहुआयामी प्रज्ञेचे, प्रतिभेचे आणि मेधावी व्यक्तिमत्वाचे किती म्हणून गोडवे गावेत? कालिदास दिनाचे औचित्य साधत या अद्वितीय महाकवीच्या चरणी माझी शब्दकुसुमांजली ! 

सुज्ञ वाचकांनी यात कालिदासांच्या प्रती असलेली माझी केवळ आणि केवळ श्रद्धाच ध्यानात असू द्यावी. मात्र माझे मर्यादित शब्दभांडार, भावविश्व आणि संस्कृत भाषेचे अज्ञान, या सर्व अडसरांना पार करीत मी हा लेख लिहिण्याचे ठरवले. मित्रांनो, संस्कृत येत नसल्याने, मी कालिदासांच्या साहित्याचे मराठीतील अनुवाद (अनुसृष्टी) वाचलेत! त्यानेच मी इतके भारावून गेले. कालिदासांच्या महान साहित्याचे मूल्यांकन करण्यास नव्हे तर एक वाचक म्हणून रसास्वाद घेण्याच्या दृष्टीनेच हा लेख लिहीत आहे!   

या कविराजांच्या अत्युच्य दर्जाच्या साहित्याचे मूल्यमापन संख्यात्मक नव्हे तर गुणात्मक रित्याच केले पाहिजे. राष्ट्रीय चेतनेचा स्वर जागवण्याचे महान कार्य करणाऱ्या या कवीचा राष्ट्रीय नव्हे तर विश्वात्मक कवी म्हणूनच गौरव करायला हवा! अत्यंत विद्वान म्हणून गणले जाणाऱ्या त्यांच्या समकालीन साहित्यकारांनीच (उदा. बाणभट्ट) नव्हे, तर आजच्या काळातल्या जगभरातल्या साहित्यकारांनी देखील तो केलेला आहे! त्यांच्या जीवनाविषयी विशेष माहिती उपलब्ध नाही. त्यांच्या नांवावर असलेल्या अंदाजे ३० साहित्य निर्मितींपैकी ७ साहित्यकृती निश्चित रूपाने त्यांच्याच आहेत असे मानले जाते. असे काय वैशिष्ट्य आहे कालिदासांच्या सप्तचिरंजीवी साहित्य अपत्यांमध्ये, की पाश्चात्य साहित्यिक कालिदासांचे नामकरण “भारताचा शेक्सपियर” म्हणून करतात! मला तर असे प्रकर्षाने वाटते की, यात गौरव कालिदासांचा नाहीच, कारण ते सर्वकालीन, सर्वव्यापी व सर्वगुणातीत अशा अत्युच्य गौरवशिखरावर आधीच आरूढ आहेत, यात खरा गौरव आहे शेक्सपिअरचा, त्याची तुलना केली जातेय कुणाशी, तर कालिदासांशी!

या महान रचयित्याचे जीवन जाणून घ्यायचे असेल तर त्यांच्या साहित्याचं वारंवार वाचन करावे लागेल, कारण त्यांच्या जीवनाचे बरेच प्रसंग त्यांच्या साहित्यकृतींमध्ये उतरले आहेत, अशी मान्यता आहे. उदाहरण द्यायचे तर मेघदूत या खंडकाव्याचे, विरहाचे शाश्वत, सुंदर तथा जिवंत रूप म्हणून या काव्याकडे बघितले जाते, बरेच तज्ज्ञ मानतात की कल्पनाविलासाचे उच्चतम निकष ध्यानी धरूनही हे कल्पनातीत दूतकाव्य अनुभवाच्या अभावी रचणे केवळ अशक्य आहे. तसेच कालिदासांनी ज्या अचूकतेने विविध स्थळांचे आणि तिथल्या नगरांचे सविस्तर वर्णन केले आहे, ते ही त्यांचे त्या त्या ठिकाणी वास्तव्य असल्याशिवाय शक्य नाही. कालिदासांच्या सप्त कृतींनी संपूर्ण विश्वाला समग्र भारतदर्शन घडवले! उज्जयिनी नगरीचे वर्णन तर अगदी हुबेहूब, जणू चलचित्रासारखे! म्हणूनच बरेच विद्वान मानतात की कालिदासांचे वास्तव्य बऱ्याच कालावधीकरिता बहुतेक या ऐश्वर्यसंपन्न नगरीतच असावे! त्यांच्या रचना भारतातील पौराणिक कथा आणि दर्शनशास्त्रावर आधारित आहेत! यात तत्कालीन भारतीय जीवनाचे प्रतिबिंब दृष्टीस पडते, रघुवंशम् मध्ये इतिहास आणि भूगोल याविषयी त्यांचे प्रगाढ ज्ञान, त्यांच्या अगाध बुद्धिमत्तेचे आणि काव्यप्रतिभेचे द्योतक आहे यात शंकाच नाही. या भौगोलिक वर्णनासोबतच भारतातील पौराणिक, राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, दार्शनिक आणि वैज्ञानिक दृष्टी व ज्ञान, तसेच सामान्य तथा विशिष्ट व्यक्तींची जीवनशैली, या सर्वांचे यथोचित दर्शन त्यांच्या रचनांमध्ये आढळते.    

त्यांच्या काव्य आणि नाटकांतील भाषा आणि काव्यसौंदर्य काय वर्णावे? भाषासुंदरी तर त्यांची जणू आज्ञाधारक दासी! निसर्गाची विविध रूपे साकारणारे ऋतुसंहार हे काव्य तर निसर्गकाव्याचे अत्युच्य शिखरच जणू! त्यांच्या इतर साहित्यात त्या त्या अनुषंगाने प्राकृतिक सौंदर्याचे बहारदार वर्णन म्हणजे जणू कांही अद्भुत इंद्रधनुषी रंगांची उधळण, आपण त्यांत रंगून जायचे, कारण हे सगळे काव्यप्रकार वृत्तांच्या चौकटीत अवचित विराजमान झालेले, ओढून ताणून बसवलेले नव्हेत! 

हे अनवट साहित्य म्हणजे अलंकारयुक्त अन नादमधुर अश्या भाषेचा सुरम्य आविष्कार! एखादी सुंदर स्त्री जेव्हा अलंकारमंडित होते, तेव्हा कधी कधी असा प्रश्न पडतो की अलंकारांचे सौंदर्य त्या सौंदर्यवतीमुळे वर्धित झालंय, की तिचे सौंदर्य अलंकारांनी सजल्यामुळे आणिक खुललय! मित्रांनो कालिदास साहित्य वाचतांना हाच भ्रम निर्माण होतो! या महान कविराजांच्या सौंदर्यदृष्टीची किती म्हणून प्रशंसा करावी! त्यात काठोकाठ भरलेल्या अमृतकलशांसम नवरस तर आहेतच, पण विशेषकरून आहे शृंगाररस! स्त्री सौंदर्याचे लोभस लावण्यमय आविष्कार तर त्यांच्या काव्यात आणि नाटकात ठिकठिकाणी आढळतात! त्यांच्या नायिकाच अशा आहेत की त्यांचे सौंदर्य वर्णनातीत असेलही कदाचित, पण कालिदासासारखा शब्दप्रभू असेल तर त्याला अशक्य ते काय? मात्र या सौंदर्यवर्णनात तत्कालीन आदर्शवादी परंपरा आणि नैतिक मूल्यांचा कुठेही ऱ्हास झालेला नाही! अलंकारांच्या गर्दीत सर्वात उठून दिसणारा अलंकार म्हणजे उपमालंकार, त्या उपमा कशा तर, इतरांसाठी अनुपमेय! मात्र जोवर या महान संस्कृत भाषेतील रचना प्राकृत प्रांतीय भाषांत सामान्य जनांपर्यंत पोचत नाहीत, तोवर या विश्वात्मक कवीचे स्थान अखिल जगात शीर्ष असूनही आपल्याच देशात मात्र अपरिचितच राहणार! अर्थात या वाङ्मयाचे कैक भारतीय भाषांमध्ये अनुवाद (अनुसृष्टी) झालेले आहेत हे ही नसे थोडके !

मेघदूत (खंडकाव्य)

खंडकाव्यांच्या रत्नपेटिकेत विराजित कौस्तुभ मणी असलेल्या मेघदूत या कालिदासांच्या रचनेचा काव्यानंद म्हणजे स्वर्गातील सुमधुर यक्षगानच होय! असे मानले जाते की, महाकवी कालिदासांनी मेघदूत हे त्यांचे प्रसिद्ध खंडकाव्य रामगिरी पर्वतावर (आत्ताचे रामटेक) आषाढ मासाच्या प्रथम दिनी लिहायला प्रारंभ केला! त्यांच्या या काव्यातील दुसऱ्याच श्लोकात तीन शब्द आलेले आहेत, ते म्हणजे “आषाढस्य प्रथम दिवसे”! आषाढाच्या प्रथम दिवशी कालिदासांनी जेव्हा आकाशात संचार करणारे कृष्णमेघ पाहिले तेव्हाच त्यांनी आपल्या अद्भुत कल्पना विलासाचे एका काव्यात रूपांतर केले, हीच ती त्यांची अनन्य कृती “मेघदूत”! यौवनातील सहजसुंदर तारुण्यसुलभ तरल भावना आणि प्रियेचा विरह या प्रकाश आणि अंधाराच्या संधिकालाचे शब्दबद्ध रूप पाहतांना आपले मन हेलावून जाते.

अलका नगरीत यक्षांचा प्रमुख, एक यक्ष कुबेराला महादेवाच्या पूजेसाठी सकाळी उमललेली ताजी कमलपुष्पे देण्याचे काम रोज करत असतो. नवपरिणीत पत्नीबरोबर वेळ मिळावा म्हणुन तो यक्ष रात्रीच कमळे तोडून ठेवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी कुबेर पूजा करत असताना त्या उमलू लागलेल्या फुलात रात्री कोंडला गेलेला भुंगा कुबेराला डंख मारतो. क्रोधायमान झालेला कुबेर यक्षाला शाप देतो. यामुळे त्या यक्षाची व त्याच्या प्रियेची ताटातूट होते. हीच शापवाणी मेघदूत या अमर खंडकाव्याची निर्माती ठरली. यक्षाला भूमीवर रामगिरी येथे १ वर्ष अलकानगरीत राहणाऱ्या आपल्या पत्नीपासून दूर राहण्याची शिक्षा मिळते. शापामुळे त्याच्या सिद्धी नाश पावल्याने तो कोणत्याही प्रकारे पत्नीला भेटू शकत नाही. त्याच विरहव्यथेचे हे “विप्रलंभ शृंगाराचे कवन” आहे. कालिदासांच्या कल्पनेची भरारी म्हणजेच हे अजरामर नितांतसुंदर असे प्रथम “दूत काव्य” म्हणून रचले गेले! मग रामगिरीहून, जिथे सीतेची स्नानकुंडे आहेत, अशा पवित्र ठिकाणाहून अश्रु भरलेल्या नयनांनी यक्ष मेघापाशी निरोप देतो! मित्रांनो आता बघू या तो सुंदर श्लोक! 

– क्रमशः भाग पहिला 

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आषाढ महिन्याचा पहिला दिवस… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

सुश्री संगीता कुलकर्णी

? विविधा ?

☆ आषाढ  महिन्याचा पहिला दिवस… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस… अर्थात महाकवी कालिदास दिन..

आषाढ शुद्ध प्रतिपदेला महाकवी कुलगुरू कालिदास दिन म्हणून सगळीकडे साजरा केला जातो…

रणरणत्या उन्हानंतर वेध लागतात ते पावसाच्या सरींचे…या पावसाच्या सरी तन आणि मन चिंब भिजवून टाकतात. ज्येष्ठ संपून आषाढ सुरू झाला की आकाशात हळूहळू मेघांची गर्दी होऊ लागते आणि मग आठवण येते ती महाकवी कुलगुरू कालिदासाची…! 

कालिदासाच्या ‘ मेघदूत ’ या काव्यातील दुसरा श्लोक ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हा अतिशय प्रसिद्ध असा श्लोक. आषाढ म्हटले की आठवतो ढगांच्या काळ्या पुंजक्यातून गडगडाट करीत बरसणारा मुसळधार पाऊस आणि कालिदासाची स्वतंत्र अभिजात साहित्य कृती..!

आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी पावसाळ्याची सुरुवात होते. आपल्या मेघदूत या महाकाव्याच्या प्रारंभी पावसाळ्याच्या सुरुवातीचे नितांत सुंदर वर्णन कालिदासांनी केले आहे… ” मेघदूत’ हे एक सर्वांगसुंदर प्रेमकाव्य आहे. हे कोणत्याही पुराणकथेवर आधारित नाही. यात कालिदासाचा स्वतंत्र निर्मितीक्षम प्रज्ञाविलास, आणि तरीही मानवी अंतःकरणातील एका सुकोमल वास्तव भावनेचाच आविष्कार करणारे कालिदासरचित “मेघदूत’ हे एक मनोज्ञ काव्य आहे..! निसर्गावर प्रेम करणारा निसर्ग प्रेमी कवी..! निसर्गाबद्दल असणारं अतोनात प्रेम त्यांच्या शब्दातून व्यक्त होतं. प्रत्येक निसर्गप्रेमींना त्यात चिंब चिंब भिजवून टाकतो..!

ग्रीष्मातील उष्मा सरला.. ढग दाटून आले की आपसूकच वातावरणातील होणारा तो बदल..सृष्टीला चढणारे नावीन्याचे रंग, सृजनाने खुललेले ते निसर्गाचे रुपडे आणि त्याला चिंब भिजवून टाकणारा आषाढ लागला की जणू हे संपूर्ण जग नव्याने जन्म घेतल्यासारखे भासू लागते…!

उपमा या अलंकाराचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून कालिदासांनी मानव आणि निसर्ग यांच्या संबंधांवर अनेक अजरामर रचना केल्या आहेत…!

कवी कालिदासांचे संस्कृत कवींमधील उच्च स्थान दर्शविणारे एक सुंदर सुभाषित……

पुरा कवीनां गणना प्रसंगे ll

कनिष्ठीकाधिष्ठति कालिदास: 

अद्यापि तदतुल्य कवेर्भावादी 

अनामिका सार्थवती बभूव ll

…. याचा अर्थ असा आहे की– पूर्वीच्या काळी संस्कृत भाषेतल्या कवींची गणना करताना त्यांना मोजताना आपल्या हाताच्या करंगळीवर पहिलं नाव कवी कालिदास यांचे आले पण त्यानंतरच्या हाताच्या बोटावर कोणाचेही नाव आले नाही कारण महाकवी कालिदासांच्या इतका उच्च प्रतीचा संस्कृत कवी कोणी नव्हताच. त्यामुळे करंगळीच्या आधीच्या बोटावर कोणाचेच नाव न आल्यामुळे त्या बोटाला अनामिका असे म्हणतात..!

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “वैचारिक स्वावलंबन…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “वैचारिक स्वावलंबन…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

लोकरंग च्या पुरवणी मधील एक खूप मस्त आणि मुख्य म्हणजे खरोखरीच विचारात पाडणारा लेख शनिवारी  चतुरंग ह्या पुरवणीत वाचनात आला. हा लेख “वळणबिंदू” ह्या सदराखाली डॉ. अंजली जोशी लिखीत “वैचारिक स्वावलंबन” ह्या नावाचा.  विशेषतः पालकत्वाची सुरुवात होतांना पासून हातपाय थकल्यावर देखील तेवढ्याच सुरसुरीनं पालकत्व निभावणा-या पालकांसाठी तर खास भेटच.

“स्पून फिडींग” ,पाल्याची अतिरिक्त टोकाच्या भूमिकेतून घेतलेली काळजी पाल्यांना कुठलाही अवयव बाद न होता कसे पंगू करुन सोडते हे परखड सत्य ह्या लेखातून चटकन उमगतं, आणि मग खोलवर विचार केल्यानंतर त्यातील दाहकता जाणवते.

खरोखरीच मुलं ह्या जगातल्या तलावात पोहोचतांना त्यांना बुडू नये म्हणून पालकत्वाचं रबरी टायर न चुकता बांधून द्या व लांबून काठावरुन त्यांच्याकडे काळजीपूर्वक बघतांना त्यांचे त्यांना पोहू द्या, कधी गटांगळ्या खाऊ द्या, अगदी काही वेळा थोडं नाकातोंडात पाणी जावून जीव घाबरु द्या, पण हे होऊ  देतांना एक गोष्ट नक्की …. आपला पाल्य हा तावूनसुलाखून, अनुभव गाठीशी बांधून पैलतीर हा यशस्वीपणे गाठणारच, आणि मग तो विजयाचा आनंद  तुम्हाला आणि तुमच्या पाल्यांना कितीतरी पट सुखं देऊन सुवर्णक्षणांची अनुभूती देऊन जातो. 

आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे – प्रसंगी अपत्यांच्या कुबड्या बनण्यापेक्षा त्याच्या मनाला उभारी देणारी संजीवनी पुरवा.

मी तर सांगेन हा लेख नीट विचारपूर्वक वाचल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने स्वतःच स्वतः ला प्रश्न विचारायचा की … ड्रेस कुठल्या रंगाचा घालू ह्या अगदी साध्या प्रश्नापासून, ते लग्नासाठी आपल्याला नेमका जोडीदार कसा हवायं ह्या गहन प्रश्नापर्यंत, आपण आपल्या मनाने, स्वतंत्र विचारशक्तीने किती निर्णय घेतलेत ? त्यापैकी किती निर्णय तडीस नेलेत ? ह्या तडीस नेलेल्या आपल्या स्वतंत्र मतांमुळे, किंवा तडीस न नेता केवळ दुसऱ्यांच्या ओंजळीने कायम पाणी प्यायल्यामुळे, आपले नेमके नुकसान झाले की फायदा झाला ? .. आणि तो नेमका किती झाला ? …..  ह्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतर आपल्याला नेमक्या वस्तुस्थितीची जाणीव होईल आणि मग अभ्यास वा विचारांनी बनवलेली स्वतंत्र स्वमतं, स्वकृती किती महत्त्वाची असते आणि ती आपल्या जीवनात किती चांगला आमुलाग्र बदल करते हे पण कळून येईल. 

तेव्हा डॉ अंजली जोशी ह्यांचा चतुरंग पुरवणीमधील “वैचारिक स्वावलंबन” हा लेख तुम्हाला मिळाला तर जरूर स्वतः आधी वाचा आणि मग आपल्या पाल्यांना पण वाचायला सांगा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares