मराठी साहित्य – विविधा ☆ अभिजात म्हणजे ? अजिबात माहित नाही… – लेखक – श्री अविनाश सी. कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

☆ अभिजात म्हणजे ? अजिबात माहित नाही… – लेखक – श्री अविनाश सी. कुलकर्णी ☆  श्री सुहास रघुनाथ पंडित 

पूर्वी पुण्यामध्ये काही टपर्‍यांवरती पाट्या पाहिल्या की वाचून हसू यायचं. यात लिहिलेल असायचं शिव्या द्या पण मराठीत. आपल्या भाषेविषयी प्रेम व्यक्त करणार्‍यांनी घेतलेली ही एक भूमिका म्हणता येईल. मराठीवर प्रेम असणारा महाराष्ट्रात माणूस नाही असं होणार नाही. माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृताते ही पैजा जिंके, असेही मराठी विषयी आदर व्यक्त करताना म्हटलं जातं. अलीकडेच आपण ऐकलं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. केंद्र सरकारने याबाबतची घोषणा नुकतीच केली. मराठी बरोबरच पाली, प्राकृत, असामी आणि बंगाली या 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला असल्याचे सांगण्यात आलं. याआधी तमिळ भाषेला सर्वप्रथम 2004 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. देशात आता एकूण 11 अभिजात भाषा झाल्या आहेत. महाराष्ट्रातील मराठी साहित्यिक, मराठी प्रेमी मंडळी गेली अनेक वर्ष मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्नशील होते. केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा अनेक राजकीय पक्षांनीही केला होता. आता हा दर्जा मिळाला आहे पण म्हणजे नक्की काय? हे अनेकांना ज्ञात नाही. मराठीला काहीतरी सन्मान मिळाला आहे आणि हा एक आनंद व्यक्त करण्याचा मुद्दा आहे असं अनेकांना ज्ञात आहे. अनेक मराठी साहित्यिकांनीही आपल्या परीने या अभिजात भाषा प्रकरणाचे विश्लेषण केलं आहे. अभिजात भाषा कशी ठरवावी याविषयी 2004 साली नियम तयार केले गेले. त्या भाषेतील ग्रंथांची पुरातनता आणि हजार वर्षाच्या इतिहासाच्या नोंदी असणं आवश्यक असल्याचं म्हटलं होतं. प्राचीन साहित्य ज्याला मौल्यवान वारसा म्हणून गणलं जाईल त्याचबरोबर साहित्य, परंपरा मूळ असली पाहिजे. ती दुसर्‍या भाषेतून घेतलेली नसावी वगैरे. तमिळ भाषेला अभिजात भाषा म्हणून ग्राह्य धरले गेलं. संस्कृतलाही हा दर्जा मिळाला. आता तब्बल वीस वर्षांनी मराठी भाषेला अभिजात भाषा ठरवली गेली. गेले काही दिवस हा विषय अजिबात चर्चेत नव्हता. अभिजात हा उच्चारही आपल्यापैकी अनेकांना अजून जमत नाही. बरेच जण अजिबात, अभिताजी वगैरे वगैरे म्हणतात. जाणीवपूर्वक कोणी मराठीची अवहेलना करत नाही पण आपल्याकडे गावनिहाय मराठी भाषा वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. प्रत्येक गावचं, शहराचं एक भाषा वैशिष्ट्य आहे. पण हे सारे मराठमोळे आपण एकत्रित आहोत. मराठीचा उच्चारही म्हराठी, मरहठ्ठी वगैरे करणारे आहेतच. पुण्यामध्ये मराठीमध्ये वेगवेगळ्या सूचना, पाट्या हे आपण सोशल मीडियामध्ये पाहतो. अनेक मराठी शिकवणारी मंडळी आहेत ते अधिकाधिक मराठी वापरण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आपल्या हिंग्लिश, हिंदी, उर्दू याचा प्रभाव असणार मराठी असल्याचं दिसतं. हल्ली तर विविध दूरचित्रवाण्यांवर मराठीचं पार पोस्टमार्टम करून टाकलं आहे. आता पहा शवविच्छेदन असा शब्द आपण वापरला असता तर हा शब्द अनेकांना रुजूलाही नसता. रेल्वेला अग्नीरथ म्हणणार्‍यांकडे आपण ग्रामीण भागातून आला की काय अशा नजरेतून पाहतो. जगातील अकरा कोटी लोकांची मराठी भाषा असून जागतिक क्रमवारीत मराठी 15 व्या स्थानावर येते. जवळपास अडीच हजार वर्ष मराठी भाषा जुनी असल्याचं सांगितलं जातं. 2012 साली प्रा. रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. भाषा ही संपर्काचं साधन आहे. एकमेकांचे विचार आपल्याला ज्या बोली भाषेमध्ये पटतात ते आपण ऐकले पाहिजेत. भाषेचा अभिमान असायला हरकत नाही. तिचा आदर केला पाहिजे पण इतरांचा अनादर करण्यासाठी याचा वापर होता कामा नये. मराठी भाषा ही अत्यंत सुंदर आहे. अनेकदा मराठी भाषेमधील शब्दांचे अनेक अर्थ निघतात. अगदी उपरोधित भाषा म्हणूनही अनेक जण मराठीचा उल्लेख करतात. महाराष्ट्रात शिवसेनेने मुंबईमध्ये त्याकाळी मराठी विषयी आग्रही भूमिका घेतली. आज आपल्या प्रचलित जीवनामध्ये शुद्ध मराठी वापरणारे कमीच आहेत. अनेकदा आपण वापरण्याचा प्रयत्न केला तरी समोरच्याला ती समजेल असं नाही. इंग्रजी, हिंदीमधील शब्द आपण मराठीमध्ये प्राधान्याने वापरतो. इंग्रजी येत नाही याचा न्यूनगंड बाळगणारे आहेतच. आज जगभरातील अकरा कोटी लोक सोडले तर इतरांना मराठी येते कुठे? असा प्रश्न आपण मनाला विचारला पाहिजे. मराठी येत नाही म्हणून त्यांचं काही अडत नाही तसे इंग्रजी येत नाही म्हणूनही आपलंही कधी काही अडलं नाही. मराठी भाषा विपुल आहे. आपलं म्हणणं दुसर्‍याला पटतयं, संवाद साधला जातोय, जवळकी येतेय मग हि भाषा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. या भाषेबद्दल आदर व्यक्त करण्याचा प्रयत्न अभिजात दर्जा मिळाल्यानं मिळालाय.

लेखक : अविनाश सी. कुलकर्णी

संकलन व प्रस्तुती : सुहास पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ३३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ३३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- पगार होईपर्यंत पुरेल एवढंच मोजकं सामान आणून दिल्यानंतर खिशात राहिली होती फक्त शंभर रुपयांची एक नोट. त्या एका नोटेतच पुढे घडणाऱ्या आक्रिताचे धागेदोरे लपलेले होते. )

“हे काय? एवढंच सामान?” रात्री जेवणाची तयारी करून ठेवल्यानंतर मी आणलेलं सामान आवरताना आई म्हणालीच.

” होय अगं. अगदी निकडीचं आहे तेवढंच आणलंय. नंतर चांगल्या दुकानातून महिन्याचं सर्व सामान आणूया” 

“आणि चहा पावडर?ती नाही आणलीस?”

“अगदीच संपली नाहीय ना?”

“आज घरमालकीण बाई येऊन भेटून गेल्या. संध्याकाळी कुलकर्णी आजी आणि वहिनीही आल्या होत्या. त्या सगळ्यांना चहा केला होता रे. त्यानंतर आता जेमतेम आपल्या दोघांच्या सकाळच्या चहापुरती शिल्लक असेल बघ. “

ही कुलकर्णी मंडळी शेजारच्याच पोस्टल काॅलनीत रहायची. प्रमोद कुलकर्णी आमच्याच बँकेच्या इथल्या दुसऱ्या ब्रॅंचमधे हेडकॅशिअर होता. त्याने माझी ओळख करून घेतली, आमचे विचार जुळले तसे मग ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले होते. दोघांच्याही आपापल्या व्यापांमुळं रोज खूप वेळ भेटणं-बोलणं व्हायचं नाही पण रोज रात्री जेवण झाल्यावर आम्ही दोघं कोपऱ्यापर्यंत पाय मोकळे करायला मात्र नियमित जायचो.

“आज प्रमोद आणि मी रात्री फिरायला जाऊ तेव्हा एखादं दुकान उघडं असेल तर घेऊन मयेईन. नाहीतर मग उद्या नक्की”

मी चहा-पावडरीच्या विषयाला असा पूर्णविराम दिला खरा पण काही झालं तरी आज मी चहाची पावडर आणणार नव्हतोच. कारण प्रमोद बरोबर असताना त्याच्यासमोर फक्त शंभर ग्रॅम चहापूड कशी मागायची हा प्रश्न होता. त्यापेक्षा उद्या दुपारी घरी जेवायला येताना आणता येईल असा विचार मी केला होता. पण झालं भलतंच. रात्री जेवण आवरून मी हात धुवत होतो तोवर प्रमोदची हांक आलीच.

“आई, मी जाऊन येतो गं” म्हणत मी बाहेर पडलो तेवढ्यांत घाईघाईने आई दारापर्यंत आली.

“लवकर ये रे. आणि येताना चहापावडर आण आठवणीनं ” प्रमोदपुढंच तिनं सांगितलं. “हो आणतो” म्हणून मी कशीबशी वेळ मारुन नेली.

आम्ही नेहमीप्रमाणे गप्पा मारत कोपऱ्यापर्यंत जाताच मी परतीसाठी वळणार तेवढ्यात प्रमोदने मला थांबवलं.

 “अहो, चहा पावडर घ्यायचीय ना? आई म्हणाल्या नव्हत्या का?ते बघा. त्या दुकानात मिळेल. ” 

ला ‘नको’ म्हणता येईना. विरोध न करता अगदी मनाविरुध्द मी मुकाट्याने प्रमोदच्या मागे गेलो.

” किती.. ?पाव किलो?” त्यानेच पुढाकार घेत मला विचारलं..

“चालेल. ” मी नाईलाजाने म्हणालो. खिशातली ती एकमेव शंभर रुपयांची नोट दुकानदाराला देऊ लागलो. त्याने ती घेतलीच नाही.

“मोड नाहीये. २५ रुपये सुटे द्या” दुकानदार शांतपणे म्हणाला. ते माझ्या पथ्यावरच पडलं होतं.

“ठीक आहे. राहू दे ” म्हणत मी विषय संपवला पण तिकडे लक्ष न देता प्रमोदने माझ्या हातातली ती नोट वरच्यावर काढून घेतली.

“सर, ती समोरची टपरी माझ्या मित्राचीच आहे. तिथे मोड मिळेल. थांबा. मी आलोच. ” तो घाईघाईने म्हणाला आणि रोड क्रॉस करून त्या टपरीच्या दिशेने गेलासुध्दा. तिथेही त्याला मोड मिळूच नये असा सोयीस्कर विचार मी करत होतो तेवढ्यात तो आलाच. मुठीत धरलेल्या पैशांमधील २५ रुपये परस्पर त्याने दुकानदाराला दिले आणि चहाचा पुडा घेऊन तो माझ्याकडे देत हातातली बाकीच्या नोटांची घडीही त्याने माझ्याकडे सुपूर्त केली. ते पैसे मी तसेच खिशात ठेवले आणि आम्ही परतीची वाट धरली.

हा खरं तर किती साधा प्रसंग. पण तो इतका सविस्तर सांगण्याचं एक खास प्रयोजन मात्र आहे. तसं पाहिलं तर कांही दिवसांपूर्वी घडून गेलेल्या त्या ‘लिटिल् फ्लाॅवर’ च्या एपिसोडशी या अगदी सरळसाध्या प्रसंगाचा अर्थाअर्थी कांहीतरी संबंध असणे शक्य तरी आहे कां? पण तसा तो होता हे नंतर चार दिवस उलटून गेल्यावर अगदी अचानक माझ्या लक्षात येणार आहे याची पुसटशी जाणिवही मला त्याक्षणी झालेली नव्हती!

पुढे चारच दिवसांनी पौर्णिमा होती. शनिवारी कामं आवरून मी निघणार होतो. शुक्रवारी रात्री झोपण्यापूर्वीच मी माझी बॅग भरून ठेवत असतानाच…..

” पहाटे तुला किती वाजता उठवायचं रे ?” आईनं विचारलं.

” पाच वाजता. ” 

सकाळी लवकर बँकेत जाऊन तातडीची कामं पूर्ण करायची तर पाचला उठणं आवश्यकच होतं. अंथरुणाला पाठ टेकताच मला गाढ झोप लागली. अचानक कुणाची तरी चाहूल लागली आणि मी एकदम जागा झालो.

” कोण आहे?” मी अंदाज घेत विचारलं.

ती आईच होती.

“पेपर आलाय रे. इथं टीपॉयवर ठेवतेय. ऊठ बरं”

“पेपर इतक्या पहाटे?” मला आश्चर्य वाटलं.

मी लाईट लावला. पेपर घेऊन सहज चाळू लागलो. माझी नजर एका पानावर अचानक स्थिरावली. मी झपकन् उठलो. कपाट उघडून पॅंटच्या खिशातलं मिनी-लॉटरीचं तिकीट बाहेर काढलं. पेपरमधल्या त्या पानावरच्या मिनी लॉटरीच्या रिझल्टनेच माझं लक्ष वेधून घेतलं होतं! हातातल्या तिकिटावरचा नंबर मी पडताळून पाहू लागलो. माझ्या तिकिटावरचे शेवटचे तीन आकडे ४७५ असे होते ज्याला एक हजार रुपयांचं बक्षीस लागलेलं होतं! माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. अनपेक्षित अशा आनंदाच्या लहरींनी मी उत्तेजित झालो. कधी एकदा हे आईला सांगतोय असं होऊन गेलं आणि मी तिला हांका मारू लागलो. पण माझ्या हाकांचा तो आवाज आईपर्यंत पोहोचतच नाहीये… दूरवर जाऊन प्रतिध्वनींमधे परावर्तित झाल्यासारख्या माझ्याच आवाजातल्या त्या हांका मलाच ऐकू येतायत असं मला वाटत राहिलं. मी अस्वस्थ झालो. कुणीतरी मला हलवून उठवतंय असा भास झाला न् मी दचकून जागा झालो.

“पाच वाजलेत रे.. उठतोयस ना?” आई जवळ येऊन मलाच उठवत होती..

.. म्हणजे मी पाहिलं ते स्वप्नच होतं हे मला जाणवलं. खरंतर पहाटे पडलेलं स्वप्न म्हणजे शुभ शकूनच! पण त्याचा आनंद क्षणभरच टिकला. कारण मी कधीच लाॅटरीचं तिकीट काढत नाही. ‘जे लॉटरीचं तिकीट मी काढलेलंच नाहीय त्याला बक्षीस लागेलच कसं?’ या मनात उमटलेल्या प्रश्नाचं मलाच हसू आलं. ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ म्हणावं तर झोपताना मी पहाटे लवकर उठून आवरायच्याच विचारात तर होतो. लॉटरीबिटरीचा विचार ओझरताही मनात असायचा तर प्रश्नच नव्हता. आणि तरीही… ? 

या अशा स्वप्नांना कांही अर्थ नसतो असं वाटलं, पण अर्थ होताच! ते सूचक असा शुभसंकेत देणारं स्वप्न होतं!!

त्यादिवशी कामं आवरून घरी जेवायला यायलाच दुपारचे दोन वाजून गेले होते. लगेचच तीनची बस पकडायची होती. तशी काल रात्रीच मी बॅग भरून ठेवली होती म्हणून बरं. कसंबसं जेवण आवरून कपाटातला समोरचा हाताला येईल तो हँगर ओढला. घाईघाईने कपडे बदलले आणि बॅग घेऊन बाहेर पडलो.

बस सुटता सुटताच कशीबशी मिळाली. बसायला जागा नव्हतीच. हातातली बॅग वरच्या रॅकवर ठेवण्यापूर्वीच कंडक्टर तिकिटासाठी गडबड करू लागला. खिसे चाचपून पैसे बाहेर काढले. नोटांच्या घडीतली वरची ५० रुपयांची नोट कंडक्टरला दिली. तिकीट घ्यायच्या गडबडीत हातातल्या नोटा खाली पडल्या. त्या उचलायला वाकलो आणि माझ्या लक्षात आलं त्या नोटांच्या घड्यांमधे कसल्यातरी कागदाची छोटी घडी दिसतेय. बसच्या हादऱ्यांमुळे धड उभं रहाताही येत नव्हतं त्यामुळे तो कसला कागद हे न बघता नोटांबरोबर तो कागदही पॅंटच्या खिशात तसाच सरकवला आणि तोल सावरत उभा राहिलो.

नृ. वाडीला गेल्यावर प्रसादाच्या नारळ-खडीसाखरेचे पैसे देण्यासाठी खिशातून बाहेर काढले तेव्हा ती कागदाची घडी म्हणजे ५० पैशांचं मिनी-लाॅटरीचं एक तिकिट आहे हे लक्षात आलं. ‘हे इथं आलं कुठून?’ हा विचार मनात येत असतानाच माझी आश्चर्यचकित नजर त्या तिकीटावरच खिळलेली होती. त्या नजरेलाच जाणवलं कीं या तिकिटावरचे शेवटचे तीन आकडेही ४७५ हेच आहेत… !

, मनात आश्चर्य होतं, हुरहूर होती, उत्सुकता होती आनंदही! त्याच मनोवस्थेत दर्शन घेऊन मी वर आलो. वाटेतल्या लॉटरी स्टॉलवर ते तिकीट दाखवलं.

” एक हजार रुपयाचं बक्षीस लागलंय” स्टॉलवाला म्हणाला. हे अपेक्षितच होतं तरीही मनातल्या मनात झिरपणारा आनंद मी लपवू शकलो नाही.

” तिकीटं देऊ?” 

“नको. पैसेच द्या” मी बोलून गेलो.

“दीडशे रुपये कमिशन कापून घ्यावे लागेल. “

” चालेल. ” मी म्हटलं.

त्याने कमिशन वजा जाता राहिलेले ८५० रुपये मला दिले आणि मी शहारलो. नेमके आठशे पन्नास रुपये? कितीतरी वेळ हे स्वप्नच असेल असंच वाटत राहिलं.

मन स्थिर झालं तेव्हा मात्र ‘मी कधीच न काढलेलं ते लॉटरीचं तिकीट माझ्या खिशात आलंच कसं?’ हा प्रश्न माझ्या मनाला टोचत राहिला. त्याचा थांग लागला तो मी सोलापूरला परत आल्यानंतर प्रमोद कुलकर्णी मला भेटला तेव्हा!

चहाचा पुडा घेण्यासाठी माझ्या हातातली शंभर रुपयांची नोट घेऊन मोड आणायला तो समोरच्या टपरीकडे धावला होता. त्याला मोड मिळाली होतीही पण ती देताना त्याचा तो टपरीवरचा मित्र त्याला सहज चेष्टेने ‘काहीतरी घेतल्याशिवाय मोड मिळणार नाही’ असं हसत म्हणाला तेव्हा प्रमोदलाही आपल्या मित्राची गंमत करायची लहर आली. ती टपरी म्हणजे त्या मित्राचा लाॅटरीचा स्टाॅल होता. त्यावरचे फक्त ५० पैशांचे ‌एक मिनी लॉटरीचे तिकीट काढून घेत प्रमोद म्हणाला, “काहीतरी घ्यायचंय ना? हे मिनी लाॅटरीचं एक तिकीट घेतलंय बघ. “

मित्रही मजेत हसला. त्याने सुट्टे पैसे परत दिलेन. प्रमोदने त्यातले पंचवीस रुपये दुकानदाराला देऊन मला दिलेले बाकीचे पैसे मी न बघताच खिशात ठेवून दिले होते आणि त्या नोटांच्या घडीतच हे लाॅटरीचं तिकिटही होतंच!

हे सगळं कसं घडलं याचं तर्काला पटणारं उत्तर माझ्याजवळ आजही नाहीय. पण दोन्ही प्रसंगांमधले एकमेकात गुंतलेले धागेदोरे आणि त्यांच्यातली वीण इतकी घट्ट होती की त्यात लपून बसलेलं कालातीत सत्य मला त्याक्षणी जाणवलं नव्हतं पण त्याच दिशेने सुरु असलेल्या विचारांमधूनच जेव्हा ते जाणवलं ते मात्र अगदी लख्खपणे…!!

दैनंदिन आयुष्यात सहज घडणाऱ्या साध्यासाध्या घटना- प्रसंगांच्या क्रमांमधेही कुणीतरी पेरून ठेवलेला एक विशिष्ठ असा कार्यकारणभाव असतोच. ते नेमकं तसंच आणि त्याक्रमानेच कां, कसं घडतं? याचा फारसं खोलात जाऊन सहसा आपण कधी विचार करत नाही. पण असा एखादा गूढ अनुभव मात्र त्याचा तळ शोधायला आपल्याला नकळत प्रवृत्त करतोच. हे सगळं कसं घडतं, कोण घडवतं ते समजून घेणं आणि ‘त्या’ ‘कुणीतरी’ पुढे नतमस्तक होणं एवढंच आपण करायचं असतं!

चहापावडर आणायची आठवण आईने प्रमोदसमोरच मला करून देणे, स्वत: पुढाकार घेऊन प्रमोदने मला त्या दुकानात माझ्या मनात नसतानाही घेऊन जाणे, तिथे मोड नाहीय हे समजताच समोरच्या टपरीवरून सुटे पैसे आणायला त्याचे प्रवृत्त होणे, तिथे अगदी न ठरवताही सहजपणे लाॅटरीचे तिकीट विकत घेणे, नोटांच्या घड्यांमधे त्याने ठेवलेले ते तिकीट अलगद माझ्या खिशात पुढे चार-पाच दिवस असे सुरक्षित रहाणे या सगळ्या घटनाक्रमांमागे विशिष्ट अशा कार्यकारणभाव होताच होता आणि त्याचा थेट संबंध माझी कसोटी पहाणाऱ्या त्या ‘लिटिल् फ्लॉवर’ एपिसोडशीच तर होता! म्हणूनच “माय गॉड वुईल रिइंबर्स माय लाॅस इन वन वे आॅर आदर.. ” हे सहजपणे बोलले गेलेले माझे शब्द असे शब्दशः खरे ठरलेले होते! याच्याइतकेच ते घडणार असल्याची सूचक कल्पना अकल्पितपणे माझ्या मनात त्या पहाटेच्या स्वप्नाद्वारे मला ध्वनीत होणे हेही अलौकिक आणि म्हणूनच खूप महत्त्वाचे आहे आणि तेवढेच आश्चर्यकारकही !!

आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा ते स्वप्न माझ्या मनात अजूनही टवटवीत आहे. हे घडल्यानंतर माझ्या अंतर्मनाचा कण न् कण शुचिर्भूत झाला असल्याची भावना त्या क्षणी मला अलौकिक असा आनंद देऊन गेली होती! त्या आनंदाचा ठसा आजही माझ्या मनावर आपल्या हळुवार स्पर्शाचं मोरपीस फिरवतो आहे!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आपल्या झाेपेचा साैदा… — लेखक – पत्रकार विकास शहा ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

? विविधा ?

आपल्या झाेपेचा साैदा… — लेखक – पत्रकार विकास शहा ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

याच वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातली घटना. बंगलोरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स म्हणजेच निमहान्स या संस्थेत एका २६ वर्षाच्या बेरोजगार तरुणाने स्वतःला व्यसनमुक्तीसाठी दाखल करून घेतलं. या तरुणाला कशाचं व्यसन होतं.. ? तर नेटफ्लिक्सवरच्या निरनिराळ्या सीरिअल्स आणि सिनेमे बघण्याचं.

हा तरुण दिवसाचे जवळपास ८ तास २९ मिनिटं सलग नेटफ्लिक्स बघण्यात घालवत होता. निमहान्स संस्थेने या तरुणाला व्यसनमुक्तीसाठी दाखल करून घेतलं आहेच. शिवाय महत्वाचं म्हणजे नेटफ्लिक्सच्या व्यसनाची नोंद झालेली जगातली ही पहिली केस मानली जाते. जगभर नेटफ्लिक्सच्या व्यसनाबद्दल जोरदार चर्चा सुरु झाली असली तरी सलग नेटफ्लिक्स बघण्याचा, त्याचा जागतिक कालावधी ६ तास ४५ मिनिटांचा आहे. या तरुणाचं नेटफ्लिक्स बघण्याचं ८ तास २९ मिनिटं हे प्रमाण गेले ६ महिने असल्यामुळे अर्थातच त्याची रवानगी व्यसनमुक्तीसाठी करण्यात आली आहे.

ही बातमी वाचत असताना आजूबाजूचे नियमित नेटफ्लिक्स बघणारे अनेक चेहरे डोळ्यासमोर येऊन गेले. विचार करत होते इतकं सतत बघण्याचा कंटाळा येत नाही का.. ? तितक्यात काही दिवसांपूर्वी वाचलेली अजून एक बातमी आठवली. नेटफ्लिक्सचे सीईओ रीड हेस्टिंग्स यांना नेटफ्लिक्सचा सगळ्यात मोठा स्पर्धक कोण आहे.. ? असं विचारलं गेलं तेव्हा त्यांनी अगदीच अनपेक्षित उत्तरं दिलं. सर्वसाधारणपणे नेटफ्लिक्स आणि अमेझॉनमध्ये बाजार काबीज करण्यासाठी चढाओढ चालू असते. असा आपला अंदाज असतो त्यामुळे नेटफ्लिक्सचा सगळ्यात मोठा स्पर्धक अमेझॉन असं आपण गृहीत धरतो, पण रीड हेस्टिंग्सने मात्र वेगळाच विचार मांडला. ते म्हणाले, ‘झोप हा आमचा सगळ्यात मोठा स्पर्धक आहे. ’ सहज हसण्यावारी नेण्यासारखा हा मुद्दा नाहीये. स्वतःच्या घरात आणि आजूबाजूला बघितलं कि नेटफ्लिक्स कुणाशी स्पर्धा करतंय हे सहज दिसतं. घुबडासारखी रात्र रात्र जागून सिरिअल्सचे सीझन्स संपवणारी माणसं हे काही दुर्मिळ दृश्य राहिलेलं नाही. एक संपली कि दुसरी अशीच सलग बघणारेही अनेक आहेत. एका तरुण मुलाला आपण व्यसनी बनत चाललो आहोत याची जाणीव होऊन त्याने त्यातून मुक्तता मिळावी आणि आयुष्याची गाडी रुळावर यावी यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात धाव घेतली पण उरलेल्यांचं काय.. ? 

नेटफ्लिक्स, त्याचं व्यसन या सगळ्याची गुंतागुंत समजून घ्यायची असेल तर सगळ्यात आधी आपल्या मनोरंजनाच्या पद्धती बदलल्या आहेत. हेही समजून घेतलं पाहिजे. एखादी सीरिअल एकत्र बसून बघणं हा प्रकार जवळपास कालबाह्य व्हायला आला आहे. कालपर्यंत मनोरंजन हा कुटुंबाचा एकत्रित वेळ होता. लोक टीव्हीवरच्या सीरिअल्स आवडो न आवडो एकत्र बसून बघत होते. त्यामुळे त्याला काही एक मर्यादा होती. आता हातातल्या स्मार्ट फोनवर सगळंच उपलब्ध झाल्यावर मनोरंजनही ज्याच्या त्याच्या मोबाईलच्या स्क्रीन पुरतं मर्यादित झालं आहे. ‘मी काय बघते हे तू बघू नको आणि तू काय बघतोयस हे बघायला मी डोकावणार नाही. ’ असा सगळं मामला. शिवाय या सगळ्याला स्थळ, काळाचं बंधन उरलेलं नाही. अमुक एक वाजताच सीरिअल बघावी लागेल, रिपीट एपिसोड बघायचा असला तरीही अमुक एक वाजताच ही भानगडच नाही. ज्याला जेव्हा वाटेल तेव्हा बघता येण्याची सोय क्रांतिकारी असली तरी माणसांचं मनोरंजन चौकटीत कोंबून टाकणारी आहे. त्यामुळे मनोरंजनाचा आस्वाद घेण्याची पद्धतच मुळापासून बदलली आहे. त्यातलं सार्वजनिक असणं लोप पावत चाललं आहे. आणि व्यक्तिकेंद्रित मनोरंजनाकडे आपण झपाट्याने चाललो आहोत.

शिवाय नेटफ्लिक्स काय किंवा अमेझॉन काय ही माध्यमे मुक्त आहेत. अजून तरी सेंसॉरशिप लागू झालेली नाही. त्यामुळे निरनिराळ्या सीरिअल्समधले मुक्त लैंगिक व्यवहार जे सॉफ्ट पॉर्न प्रकारातले असतात, सहज बघण्याची सोय आहे. ते चांगलं कि वाईट हा निराळ चर्चेचा मुद्दा. मुळात उपलब्ध आहे हे महत्वाचं. मनोरंजन स्वतःपुरतं मर्यादित राखण्यामध्ये हाही महत्वाचा मुद्दा असतोच, नाकारून चालणार नाही.

या सगळ्याचा आपल्या झोपेवर परिणाम होतोय. नेटफ्लिक्स आज उघडपणे म्हणतंय कि त्यांची स्पर्धा माणसाच्या झोपेशी आहे. तो जितका कमी झोपेल आणि नेटफ्लिक्स बघण्यात वेळ घालवेल तितकं बरं.. ! खरंतर नेटफ्लिक्सने हे उघडपणे सांगितलं इतकंच बाकी अमेझॉन, हॉटस्टार यांचीही स्पर्धा झोपेशीच आहे. इतकंच कशाला या सगळ्या आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म आधी आलेल्या युट्युबनेही न बोलता कायम आपल्या झोपेशी स्पर्धा केली आहे. फेसबुकही तेच करतंय. झोपेतून उठत नाही तोच फेसबुक आणि व्हाट्स अँप उघडणारे अनेक असतात. मध्यरात्री अचानक उठून फेसबुक बघणार्‍यांची आणि मग त्याच तंद्रीत परत झोपणार्‍यांची संख्या वाढतेय. रात्री झोपताना तरी किमान फोनचा डाटा बंद केला पाहिजे हा विचार डाऊनमार्केट आणि कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.

रोजचा दीड जीबी डाटा ही स्वस्ताई नाहीये, त्या दीड जीबीसाठी आपण झोपेच्या निमित्ताने प्रचंड मोठी किंमत चुकती करतो आहोत. ज्याचा संबंध थेट आपल्या शारीरिक-मानसिक-सामाजिक आणि आर्थिक आरोग्याशी आहे. आपल्याला आभासी जगात एखादी गोष्ट स्वस्तात किंवा फुकट मिळते म्हणजे ती खरोखर फुकट नसते. फेसबुक वापरण्याचे खिश्यातून पैसे आपण देत नाही. नेटफ्लिक्स वापरण्याचे जे पैसे देतो त्याच्या कितीतरी पट अधिक मनोरंजन आपल्या हातात असतं, ज्यामुळे ते जवळपास फुकट आहे असं आपल्याला वाटत असतं. पण आधुनिक काळात, आभासी जगाच्या दुनियेत बाजार निराळ्या पद्धतीने पैशांची वसुली करत असतो. इथे कुठलीही गोष्ट फुकट मिळत नाही. स्वस्तातही मिळत नाही. प्रत्येक गोष्टीची किंमत असते. मनोरंजन अधिकाधिक व्यक्तिकेंद्रित बनत चाललंय कारण सध्या सौदा आपल्या झोपेचा आहे.

आपण जितके कमी झोपणार, डिजिटल माध्यमातून मनोरंजन देणार्‍या कंपन्या तितक्याच मोठ्या होत जाणार. हे भयंकर आहे. अस्वस्थ करणारं आहे. प्रत्येकजण बोली लावतोय, माणसांची झोप कमी व्हावी यासाठी तेव्हा, आपल्या झोपेचा सौदा किती होऊ द्यायचा याचाही ज्याने त्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

 ♥ ♥ ♥ ♥ ♥

लेखक : पत्रकार विकास शहा,

तालुका प्रतिनिधि दैनिक लोकमत, शिराळा ( सांगली )

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लोकशाहीचा बाळगू अभिमान – चला करू या मतदान ☆ डॉ. शैलजा करोडे  ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 विविधा 🌸

☆ लोकशाहीचा बाळगू अभिमान – चला करू या मतदान ☆ डॉ. शैलजा करोडे 

देशाचा चौथा आधारस्तंभ म्हणजे लोकशाही.

लोकांनी, लोकांचे, लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही. यात लोकांचाच सहभाग महत्वाचा असावा. लोकांचा सहभाग निश्चित होतो मतदानातून.

मतदानातून निवडून उमेदवार हे जनतेचे प्रतिनिधी म्हणून काम करतात किंवा त्यांनी तसे करावे ही खरी लोकशाहीची व्याख्या.

पण आजकाल तसे होत नाही. मतदारांना पैशांचे आमिष दाखवून मतं खरेदी करणं, धाक धपटशा दाखवून मतदान केंद्र ताब्यात घेणं, मतदान पेट्या पळविणं, EVM मशीनमधील घोळ हे प्रकार अगदी सर्रास होतात.

उमेदवार लोकांना भूलथापा देतात, निवडणूकी चा जाहीरनामा व प्रत्यक्ष स्थिती यात जमीन आसमान चा फरक असतो. मतदानासाठी दारोदार फिरणारे हे उमेदवार निवडून आल्यानंतर जनता जर्नादनाला लवकर भेटही देत नाही, त्यांचे काम करणे तर दूरच.

आपल्याला हवा तो उमेदवार निवडून यावा यासाठी सगळ्यांनी मतदान करणे फार गरजेचे आहे.

उमेदवार शिकलेला असावा, एकदमचं अंगूठाछाप नसावा, जनतेच्या प्रश्नांची जाणीव व त्यासाठी झटणारा हवा. गुन्हेगारी प्रवृृृृत्तीचा तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला हवा. बोलणं व प्रत्यक्षकृती यात अंतर ठेवणारा नसावा. थोडक्यात तो सच्चा देशभक्त व लोकसेवक असावा.

मतदारांनी आपले मत विकू नये. तसे करणे म्हणजे एका भ्रष्ट उमेदवाराला मत दिले जाईल. या दिलेल्या पैशांची वसूली तो किती भ्रष्ट मार्गांनी करेल याची कल्पनाच न केलेली बरी.

म्हणूनच आपलं अनमोल मत योग्य उमेदवाराला द्या. मतदान करा. कारण मतदार हा खर्‍या अर्थानं राजा आहे. म्हणून प्रत्येकानं आपलं राजेपण जपावं. लोकशाहीला अबाधित ठेवण्यास हातभार लावावा.

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “भाजी खरेदी शास्त्र !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? विविधा ?

☆ भाजी खरेदी शास्त्र ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

काहीतरी कुरबुर झाल्याने नवरोबा रागाच्या भरात घरातून बाहेर निघाले… सौ. म्हणाल्या. “कुठे निघालात?” आधीच वैतागलेले श्री. म्हणाले, “मसणात!”

सौ. म्हणाल्या, “येताना कोथिंबीर घेऊन या!”

(नवऱ्याला) ‘एक मेलं काम धड येत नाही’ या कामांच्या यादीत भाजी आणणं हे काम बरेचसे वरच्या क्रमांकावर आहे!

खरं तर या नवरोबांनी बायको समवेत भाजी खरेदीस गेल्यावर नीट निरीक्षण करायला पाहिजे. साडी खरेदी करायला गेल्यावर दुकानाच्या बाहेर किंवा दुकानातल्या गादीवर एका कोपऱ्यात बसून केवळ पैसे देण्यापुरते अस्तित्व ठेवून कसे भागेल?

भाजी खरेदी करणे हे एक परिपूर्ण शास्त्र आहे. यात पारंगत नसलेला मनुष्य ऐहिक जीवनात कितीही शिक्षित असला तरी बायकोच्या लेखी बिनडोक!

एकतर पुरुषांच्या लक्षात राहत नाही कोणती भाजी आणायला सांगितली आहे ते! शिवाय अनेकांना चवळी आणि तांदुळजा, माठ या भाज्या दिसायला थोड्याशा सारख्या असल्यातरी ‘मुळा’त निरनिराळ्या असतात, हेच ठाऊक नसते. हे लोक संत्रे आणायला सांगितलेले असेल तर हटकून मोसंबी घेऊन घरी जातील. आणि, संत्री नव्हती त्याच्याकडे असे उत्तर देऊन टाकतील बायकोने विचारल्यास!

काही पुरुष ज्या भाजीवल्याकडे जास्त गर्दी असेल त्याच्याकडून भाजी घेण्याचा सुरक्षित मार्ग निवडतात.. आणि फसतात! कारण गर्दीने उत्तम माल आधीच उचललेला असतो… आले कचरा घेऊन! असे वाक्य या लोकांना ऐकून घ्यावेच लागते आणि जी काही भाजी आणली असेल ती आणि अपमान गप्प गिळावा लागतो!

भाजी तीस रुपयांत विकत घेऊन घरी बायकोला मात्र वीसच रुपयांत आणली असे खोटे सांगणारी एक स्वतंत्र प्रजाती पुरुषांत आढळून येते! यांना बायको नंतर तीच भाजी तेवढ्याच रुपयांत आणायला सांगते!

काही लोक इतर लोक जी भाजी खरेदी करत आहेत तीच खरेदी करून घरी येतात. ती भाजी नेमकी घरी कुणाला नको असते.

कढीपत्ता, कोथिंबीर ह्या गोष्टी फ्री मध्ये न मिळवू शकणाऱ्या पुरुषांना महिला कच्चे खेळाडू समजतात.

चांगले कलिंगड खरेदी करणे म्हणजे एखादा गड जिंकल्यासारखी स्थिती असते. यात दगा फटका झाल्यास गृहमंत्री अक्षरशः आणणाऱ्या इसमाची शाब्दिक कत्तल करू शकतात! पुढच्या वेळी मी सोबत असल्याशिवाय काहीही खरेदी करायची नाही अशी बायको कडून प्रेमळ सूचना मिळू शकते!

एक किलो सांगितली आणि तीन किलो (चुकून) आणली असेल भाजी तर काही धडगत नसते. ‘ स्वस्त होती म्हणून घेतली ‘ असे उत्तर देऊन वेळ मारून नेताना नक्की कशी किलो होती? या प्रश्नाचे उत्तर देताना भंबेरी उडू शकते. कारण काही मुखदुर्बल माणसे विक्रेत्याला भाव विचारण्याच्या भानगडीत पडत नाहीत किंवा तशी हिंमत दाखवत नाहीत!

काही खरेदीदार विक्रेत्याच्या सद्सदविवेक बुद्धीवर विश्वास टाकतात.. तुमच्या हाताने घाला… चांगली असेल ती ‘ असे म्हणून फक्त पिशवी पुढे करतात. विक्रेत्याला त्याची सगळीच भाजी, फळे लाडकी असतात! 

कॅरी बॅग जमान्यात प्रत्येक भाजी किंवा फळासाठी स्वतंत्र बॅग मागू न शकणारा नवरा निष्काळजी समजणाऱ्या पत्नी असू शकतात!

तोंडली लालेलाल निघाली की बायकोच्या तोंडाचा दांडपट्टा आडदांड नवरा असला तरीही आवरू शकत नाही. जाड, राठ भेंडी, जाडसर काकडी, मध्ये सडलेली मेथी, कडू दोडका, आत मध्ये काळा, किडका असलेला भोपळा, फुले असलेली मेथी, भलत्याच आकाराचे आणि निळे डाग असलेले बटाटे, नवे कांदे, किडका लसूण, सुकलेलं आलं, बिन रसाचे लिंबू, शेवग्याच्या सुकलेल्या शेंगा, मोठ मोठ्या बिया असलेली वांगी, इत्यादी घरी घेऊन येणाऱ्या पुरुषांना बायकोची बोलणी खावी लागतातच… पानावर बसलेलं असताना धड उठूनही जाता येत नाही… आपणच आणलेली भाजी पानात असते!

आणि एवढ्या चुका करूनही भाजी आणायचं काम गळ्यात पडलेलं असतं ते काही रद्द होत नाही! शिकाल हळूहळू असा दिलासा देताना आपल्या हातात पिशवी देताना बायकोचा चेहरा पाणी मारलेल्या लाल भडक टोमॅटो सारखा ताजा तरतरीत दिसत असतो आणि आपला शिल्लक राहिलेल्या वांग्या सारखा!

हे टाळायचे असेल म्हणजे बोलणे ऐकून घेणे टाळायचे असेल तर या लेखासोबत असलेला फोटो zoom करून पाहावा. शक्य झाल्यास प्रिंट काढून enlarge करून जवळ बाळगावा!

काही नाही.. एका उच्च पदस्थ अधिकारी नवऱ्याला त्यांच्या बायकोने भाजी कोणती आणि कशा दर्जाची आणावी याची सचित्र, लेखी work order काढलेली आहे… त्या कागदाचा फोटो आहे साधा. पण बडे काम की चीज है!. खरोखर ही ऑर्डर एकदा वाचायलाच हवी…… ( फक्त जरा enlarge करून.. ) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वेळ झाली भर माध्यान्ही… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर ☆

सुश्री सुलभा तेरणीकर

🔅 विविधा 🔅

☆ वेळ झाली भर माध्यान्ही… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर 

माघातल्या एका प्रसन्न सकाळी जाग येई ती उतू गेलेल्या दुधाच्या खरपूस वासाने. उठून पाहिले, तर गच्चीवर सुरेख रांगोळीच्या चौकटीत शेणाची गोवरी तापून लाल झालेली असे आणि त्यावर बोळक्यातले दूध फेसाळत बाहेर पडताना दिसे. आईची अशी व्रतवैकल्ये, कुलाचार, सण वर्षभर चालत असत. त्यासाठी मात्र घरातल्यांचे दिनक्रम मोडत नसत, की बुडत नसत. बरेवाईट प्रसंग येऊन गेले; पै-पाहुणे, आजारपण येत गेले तरी घरातला दिनक्रमाचा रोजचा परिपाठ सुरळीत राहिला, तशी तिची नेमनियमांची मालिकाही राहिली. शाळा, कॉलेज, ऑफीस, अभ्यास हुकवून चालायचा नाही, हा दंडक पाळतच ती सुरु राहिली.

आजदेखील कसोशीने ती सर्व पाळत असते, कोणतेही अवडंबर न माजवता, अगदी सहजपणे.

श्री विष्णूंसाठी नैवेद्य म्हणून अधिक महिन्यातले तेहतीस दिवस रोज ताजा अनरसा होई खरा; पण त्या वेळी हजर असणाऱ्याच्या वाट्याला अचूक जाई. कृष्णजन्माच्या वेळी मध्यरात्री उठून ती हरी विजयातला कृष्णजन्माचा अध्याय वाचत असे. आम्हाला सकाळी सुंठवडा व पेढ्यांचा प्रसाद मिळत असे. रात्रीच्या नि गूढ शांततेत सारी झोपलेली असता, स्वतः मात्र हळूच आवाज न करता ती कृष्णजन्माची साक्षी होत असे. आता मात्र आम्ही त्यात सहभागी होतो. पण, पूर्वी क्वचित चेष्टाही करीत असू, जोरदार चर्चादेखील; पण छानसे हसून ती आमची धार बोथट करीत असे.

पुढे व्रतवैकल्यांसंबंधीची बरीच माहिती मी जमवली. जाणकारांकडून, पुस्तकांतून घेतली. व्रतरत्नाकर, हेमाद्रि व्रतखंड, व्रतोत्सव, पृथ्वी चंद्रोदय, उत्सवसिंधू इत्यादी ग्रंथसंभारातून दिलेल्या माहितीचे भांडार जमा झाले. आपल्या अभ्युदयासाठी, सुखसमृध्दीसाठी; वंशविस्तार, दीर्घायुष्य, धन, मान्यता, कीर्ती, आरोग्य यांसाठी आपल्या पूर्वजांनी व्रत नियमांमध्ये जीवनाला असे काही बांधून घेतले आहे;जसा वाहत्या नदीतीरावरचा रेखीव घाट असावा. व्रत निवडायचे स्वातंत्र्य. हेतू काम्य अथवा निष्काम. प्रसन्न करायच्या देवदेवता वेगवेगळ्या, व्रताचा दिवसही खास. त्यांची सामग्रीही आगळीवेगळी.

व्रतांची नामाभिधाने अगदी वैशिष्ट्यपूर्ण… पक्षसंधिव्रत, फलत्याग व्रत, नदी व्रत, लक्षपद्म व्रत, वरुणव्रत, भानुव्रत, बिल्वत्रिरात्री व्रत, नक्षत्रव्रत, व्योमव्रत, सप्तसागरव्रत, समुद्रव्रत, मुखव्रत , प्रतिमाव्रत पाताळव्रत अशी कितीतरी व्रतांची नावे- ज्यात निसर्गाला सहभागी करून घेतलेले आहे.

व्रताची तिथीही निश्चित केलेली आणि त्यांनाही सुंदर चेहरा, ओळख आणि नावे बहाल केलेली दिसतात. मनोरथ पौर्णिमा, पुष्प द्वादशी, नील ज्येष्ठा, फळ तृतीया, रोहिणी अष्टमी, भद्रा सप्तमी, श्री पंचमी, नाम नवमी, मंदार षष्ठी, यम चतुर्थी… प्रत्येक महिन्यातील, ऋतूंमधला एकेक दिवस स्वतंत्र अस्तित्वाचा! प्रत्येकाचे विधान आगळेवेगळे सांगितलेले.

उपवास, पूजा-अर्चना, दान ही प्रमुख अंगे तर आहेत; शिवाय निसर्गदेवतेला प्रसन्न करण्याच्या तऱ्हादेखील निरनिराळ्या असत. ऐश्वर्य हवे, तर त्याग आला. काही हवे, तर काही द्यावे; ही भावना सूचित केलेली असे. फुलांनी, धान्यांनी, मधतूपाने, धूपदीपांनी पूजा करायची. घरादारासाठी समृद्धीची कामना करणाऱ्यांनी एकभुक्त राहायचे. भोजनादी दानधर्म, बांधवांना सहभागी करून घ्यायचे, अशा बहुविध संकल्पना गुंफून आपल्या पूर्वजांनी योजलेल्या व्रतांची अखंड साखळी सर्व वर्षभर अखंडपणे माझ्यासमोर निनादत राहिली. प्रदीर्घ आयुष्य, बहरलेला वंशवृक्ष, समृद्धी, कुटुंब आणि समाजहित, निसर्गाशी जवळीक असे विविध रंग साधलेले पाहताना मन विस्मयाने भरले. … नक्षत्रे, आकाश, पाणी, सूर्य, चंद्र, पशू, पक्षी, धनधान्य, यांच्याशी खेळ करीत पूर्वजांनी व्रतोत्सवाची लयलूट केलेली आहे.

आश्विनातल्या गडद अंधाऱ्या रात्री गोठ्यात, पाणवठ्यावर, गच्चीवर, निर्मनुष्य रस्त्यावर, ओसाड जागेत दिवा लावावा, असे सांगणाऱ्या पूर्वजांच्या दीपोत्सवाच्या कल्पनेमागची उदात्तता मनाला स्पर्शून जाते.

व्रतवैकल्यांची कालबाह्यता ठरवणे, त्यांचा नवा अन्वय लावणे, हा विचार तर व्हायला हवा, असे वाटत असताना काळाच्या मागे जाऊन मानवी मनाच्या खुणा शोधाव्यात, असे वाटते, नव्या -जुन्या विचारांच्या हिंदोळ्यावर एके ठिकाणी मन थांबते. पुन्हा एकदा आपल्या पूर्वजांनी दिलेल्या अर्थपूर्ण नावाचे कौतुक वाटून धक्कायला होते. ‘अक्षय्य तृतीया’ वैशाखातल्या तृतीयेचा दिवस एक अपूर्व नाव घेऊन येतो. ‘अक्षय्य तृतीया. ‘ — वैशाखातील उग्र निसर्गवणव्यात सारे चराचर जळतेय्. अंगाची काहिली होतीय्. पाणीदेखील डोळ्यांदेखत वाफ होऊन उडून चालले आहे. अशामध्ये ‘अक्षय्य’ टिकणारे आहे तरी काय? क्षणभंगुर, अशाश्वत जीवनाला झोडपणाऱ्या निसर्गाच्या अग्निप्रलयात अक्षय्य राहणार तरी काय? प्राण कासावीस होत आहेत. अशा वेळी ही तृतीया काय सांगतीय्?

– – अशा वेळी हजारो वर्षे ऋतुचक्र न्याहाळणारी आमची भारतीयांची अनुभवकथा सांगतीय् – पाणपोई उघडा. माणसांना, जनावरांना, पक्ष्यांना पाणी द्या. या वणव्यात फुलणारी झाडे पाहा. त्यांची हिरवी पालवी तीव्र जीवनेच्छेचे प्रतीक आहे. सावली धरणारे वृक्ष लावा. जलकुंभ द्या. पंखा द्या. सावली द्या. अक्षय्य टिकणारा हा मानवधर्माचा विचार अक्षय्य तृतीयेचे लेणे लेवून येतो…

… पक्ष्यांना, जनावरांना, कृमी -कीटकांना आणि श्रांत पांथस्थाला आधार देणाऱ्या वृक्षांचे वैशाख वणव्यातले फुलणे मनाला दिलासा देऊन जाते. ज्याने कुणी या दिवसाला अक्षय्य हे नाव दिले, त्याच्या विशाल दृष्टीला वृक्षराजीच दिसली असेल. पाणथळाच्या जागा दिसल्या असतील.

निसर्गाचे अद्भुत देणे थेंबाथेंबाने जपायचे-… तहानलेल्याला द्यायचे- हा विचार असणार.

… अशाश्वत जीविताचा हा तहानलेला ऋतू अखंड सौख्याने भरून काढायचा…

संकटमुक्त व्हावे, ईप्सित साध्य व्हावे, मनोकामना पूर्ण व्हाव्यात, उत्तम आरोग्य लाभावे- अशा मागण्यांची यादी संपतच नाही. इवल्याशा जीवनात त्या साध्य तरी कशा व्हाव्यात? शिवाय, चिरकाल लाभावे असे नेमके काय मागावे? प्रश्नांचा गुंता वाढत जातो.

… खूप उन्हाळे पाहिलेली आई म्हणते- “चांगली दगडाची परात आण. पारवे, चिमण्या, कावळ्यांना दुपारी पाणी लागतं ना! परातीत पाणी भरूयात… प्लॅस्टिकचं तसराळं सांडून टाकतात ते… ” 

… भर दुपारी चाललेली त्या पाखरांची पाण्यासाठीची भांडणे पाहताना मौज वाटते… नव्हे, अतीव सुख दाटते.

©  सुश्री सुलभा तेरणीकर

मो. 8007853288 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आठवणी जागृत करणाऱ्या गोष्टी – पत्र ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

आठवणी जागृत करणाऱ्या गोष्टी – पत्र ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

कालच एक पत्र वाचले. म्हणजे चक्क मिळाले. मेसेज करण्याच्या काळात पत्र वाचून मी पण थक्क झाले. आणि आनंद देणारा आश्चर्य वाटणारा एक सुखद धक्का बसला. ज्येष्ठ व आदरणीय लेखकांची पुस्तके व त्या बरोबर त्यांचे स्व हस्ताक्षरातील पत्र मिळाले. पत्र कसे लिहावे व कसे असावे याचा उत्तम आदर्श नमुना वाचायला मिळाला. आणि खूप वर्षे मन भूतकाळात गेले. 

पूर्वी संपर्कासाठी मुख्यत्वे तेच साधन असायचे. आणि कोणते पत्र आहे त्या वरून त्याचे महत्व लक्षात यायचे. म्हणजे साधे पत्र ( ज्यावर मजकूर थोडक्यात व पत्ता लिहायला जागा असायची. ) आम्ही त्याला १० पैशाचे किंवा खाकी पत्र म्हणत असू. ते उघडे असल्याने कोणीही वाचू शकत असे. त्यावर साधारण नापास असणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल असायचा. त्याची निकालाच्या आधीच्या दिवशी वाट न बघितली जायची. म्हणजे माझ्या घरात नको यायला असे वाटायचे. वाड्यात किंवा आपल्या भागात पोस्टमन दिसला की पोटात भीतीचा गोळा यायचा आणि पुढचा प्रसाद ( मार ) डोळ्या समोर यायचा. तो पोस्टमन घरासमोरून जायला लागला की हृदय बाहेर पडते की काय असेच वाटायचे. थोडक्यात पण महत्वाचे असे त्यावर लिहिले जायचे. कोणी गावाहून पत्र लिहायचे. ४ वाजता सुखरूप पोहोचलो. काळजी नसावी. वर सुरुवातीला ती. बाबा/आई यांना सादर प्रणाम. व शेवटी आपला आज्ञाधारक असा मजकूर असायचा . आणि काहीही मायना नसलेले पत्र दिसले की निरक्षरांना पण कळायचे, की वाईट बातमी आहे. त्यात फक्त एकच ओळ असायची —- व्यक्तीला देवाज्ञा झाली. आणि तेच पत्र फाडले जायचे. 

दुसरा प्रकार होता निळ्या रंगाचे आंतरदेशीय पत्र. त्यात तीन पाने लिहायला मिळायची. आणि कडा दुमडून ते सिल करता यायचे. म्हणजे आपला मजकूर सुरक्षित. सहज वाचता यायचा नाही. तसे पत्र गोल करून,बाजूची दुमड काढून वाचता यायचे किंवा उघडून परत सफाईने चिकटवता यायचे. हे उद्योग पण बालपणात शिकले होते. अर्थात त्या साठी प्रसाद पण खाल्ला आहे. पण काही संभाव्य धोक्या पासून वाचवले पण आहे. 

अजून सर्वात सुरक्षित प्रकार म्हणजे फिकट खाकी पाकीट ( आम्ही त्याला पिवळे पाकीट म्हणत असू ) असायचे. त्यात मात्र आपलेच कागद लिहून ते एकदम पक्के चिकटवून पाठवता यायचे. त्यात खाजगी सुरक्षितता जास्त होती. आणि असे आपले स्वतंत्र रंगाचे, नक्षीचे पाकीट पाठवता यायचे. फक्त त्याला पोस्टाचे तिकीट लावावे लागायचे. आणि हो, त्यात सुगंधी मजकूर पण पाठवता यायचा. आमच्या घरी जेव्हा असे सुगंधी पाकीट आले होते,त्यावेळी आपल्या ताईची पसंती आली हो… असे ओरडतच पोस्टमन सगळ्यांना समजेल अशी दवंडी देत आला होता. आणि आईला म्हणाला होता. पत्र देतो पण आधी गोड बातमी साठी फक्कड चहा पाहिजे. मग आई गॅस कडे,वडील पत्राकडे आणि छोटी बहीण डोळे विस्फारून आणि वाड्यातील मंडळी कान टवकारून तयारीत होते. मी कोणत्या कोपऱ्यात होते ते मलाही आठवत नाही. पण पाकीट, आतले कागद याचा सुगंध मात्र अजून आठवतो आहे. 

मुख्यत्वे सामान्य लोकांना हे तीन प्रकार परिचित असायचे. बाकीचे रजिस्टर,VP असायचे पण ते फार क्वचित दिसायचे. ही पत्रे पण फार निगुतीने सांभाळली जायची. एक वरच्या बाजूस हुक व खाली कॅरमच्या सोंगटीसारखी सोंगटी असायची. आणि येणारे टपाल दर ८/१५ दिवसांनी तारखेप्रमाणे लावली जायची. अर्थात त्यात बिले,पावत्या पण असायच्या. ती तार वरच्या हुक पर्यंत भरली की त्याचे गठ्ठे करून सुतळीने बांधून ठेवले जायचे. हे काम मला फार आवडायचे. ते सगळे लावताना त्याचे पुन्हा वाचन व्हायचे. अजूनही काही पत्रे जपून ठेवली आहेत. आणि अधून मधून ती काढून वाचून,झटकून,पुसून त्या बॅगेत कापूर घालून ठेवली जातात. 

अशी पत्रे म्हणजे मला एक सुगंधी कुपी वाटते. कडू,गोड आठवणी असतात. आणि त्या वेळचे प्रसंग जिवंत करण्याची त्यात ताकद असते. काही भूतकाळातील वेडेपण,काही शिकवणी,काही उपदेश असे बरेच काही असते. शिवाय त्या व्यक्तीचे हस्ताक्षर असते. त्यातून पण खूप शिकायला मिळते. 

तर आज रमेशचंद्र दादांच्या पत्रामुळे हे सगळे लिहिले गेले. याचे सर्व श्रेय त्यांना व त्यांच्या पत्राला आहे.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लुप्त होत असलेल्या व्यक्ती – शेजार… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

?  विविधा ?

लुप्त होत असलेल्या व्यक्ती – शेजार… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

जाता जाता सहज एक संवाद कानावर पडला. बागेत फिरायला आलेल्या व्यक्तींची ओळख झाली आणि बोलता बोलता त्यांना समजले आपण शेजारी आहोत. त्या दोन शेजारी राहणाऱ्या शेजाऱ्यांची ओळख बागेत झाली. किती जग पुढे गेले आहे ना (?) 

त्या मानाने आमची पिढी फारच मागास म्हणावी लागेल. कारण आम्ही म्हणजे घरातली भाजी आवडली नाही म्हणून हक्काने शेजारी जाऊन जेवत होतो. आपल्या घरात काय चालले आहे याची माहिती शेजाऱ्यांना असायची. लग्नाच्या मुलीला बघायला पाहुणे येणार असतील तर तिचे आवरणे (मेकअप) शेजारच्या घरात होत होता. आणि जास्त पाहुणे आले तर शेजारी त्यातील काही पाहुणे स्वतःच्या घरी नेत होते. आणि त्यांचा व्यवस्थित पाहुणचार करत होते. हे सर्व वाडा किंवा चाळ संस्कृतीत होत होते. अगदी वाटीभर साखर, चार लसूण पाकळ्या, दोन मिरच्या, दोन कोथिंबीरीच्या काड्या यांची हक्काने देवाण घेवाण चालायची आणि गरम पोहे, भाजी आपुलकीने घरात यायची. सगळी मुले सगळी घरे आपलीच असल्या प्रमाणे वावरत होते. आणि शेजारी हक्काने प्रेम व शिक्षा दोन्ही करत होते. आणि त्यावर कोणाची काहीच हरकत नव्हती. ठराविक वेळेत घराचे दार उघडले नाही तर शेजारी चौकशी करत होते. जर उशिरा उठायचे असेल तर आदल्या दिवशी शेजारी सांगावे लागत होते.

सामान आणायला गेल्यावर दुकानदार हक्काने कोणताही पाढा किंवा कविता म्हणायला लावायचा. आणि काही चुकले तर घरी रिपोर्ट जायचा. आमच्या घरा जवळचे एक दुकानदार दुकानात येणाऱ्या मुलांना पाढे म्हणायला लावायचे आणि पाढा आला नाही तर वस्तू द्यायचे नाहीत. मग त्यांच्याकडे तो पाढा पाठ करून जावे लागत होते. अशी समाजाकडून प्रगती होत होती.

त्यामुळे बाहेर वावरताना एक धाक होता. आपले काम सोडून कोणी मूल इतरत्र दिसले तर शेजारी हक्काने कान पकडून घरी आणत होते. आणि घरातील व्यक्ती म्हणायच्या असेच लक्ष असू द्या. त्यामुळे मुले बिघडण्याचे प्रमाण खूप कमी होते. प्रत्येक घरात संध्यादीप लागले की शुभंकरोती म्हटले जात होते. सर्व मुले एकत्रित पाढे, कविता म्हणत होते. आणि एखाद्या मुलाला घरी यायला उशीर झाला तर सगळे शेजारी त्याला शोधायला बाहेर पडत होते.

अगदी लग्न ठरवताना वधू किंवा वर यांची चौकशी समाजातील किराणा दुकानदार, न्हावी, शिंपी यांच्याकडे केली जात होती. कारण ती चर्चेची ठिकाणे होती. आणि त्यांनी वधू किंवा वर यांची वर्तणूक चांगली आहे असे सांगितले की, ते लग्न निश्चित ठरायचे. अशा खूप आठवणी आहेत.

पण माणसे प्रगत झाली. शेजारचे जवळचे नेबर झाले. घरे फ्लॅट झाली. शेजारचे काका अंकल झाले. ज्यांची ओळख आपोआप होत होती त्यांची ओळख बागेत होऊ लागली. शेजाऱ्यांच्या घरातील वावर कमी झाला. शेजारी फोन करून घरी आहात का? येऊ का? असे विचारु लागले. दोन घरात एकच भिंत असून मनात दुरावा वाढला. तुम्हाला काय करायचे आहे? किंवा आपल्याला काय करायचे? अशी भूमिका दोन शेजाऱ्यांच्या मनात निर्माण झाली. आणि सर्वांनाच अपेक्षित पण घातक स्वातंत्र्य मिळाले. सध्याच्या काही मुलांच्या बाबतीतल्या घटना बघितल्या की वाईट वाटते. आणि कुठेतरी हे ओढवून घेतलेले स्वातंत्र्य याला कारण असावे असे वाटते. आपुलकीचा शेजार असेल तर नकळत संस्कार होतात. मुलांना थोडा धाक असतो. हल्ली पालक वारेमाप पैसा मिळवतात. आणि मुलांना पुरवतात. कोणाचाच धाक नाही. आम्ही काहीही करु तुम्ही कोण विचारणारे? असे विचार वाढत आहेत. याला कोणते स्वातंत्र्य म्हणायचे हेच कळत नाही.

माझ्या सारख्या शेजाऱ्यांच्या प्रेमात व धाकात वाढलेल्या ( सध्या याला मागासलेले म्हणतील ) व्यक्तीला हे अती स्वातंत्र्य खुपते आणि चिंता वाटते. सगळे माझ्या मताशी सहमत असतील असे नाही. पण मला लुप्त होत असलेले शेजारी आठवतात. आणि आवश्यक वाटतात

लेखक : अज्ञात 

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “नावात काय आहे?” ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? विविधा ?

☆ “नावात काय आहे?…” ☆ श्री सुनील शिरवाडकर

काही जणांना एक सवय असते. चित्रपट सुरु झाला.. टायटल्स संपले की मग आत.. म्हणजे थिएटर मध्ये जायचे. टायटल्स काय बघायचे असा त्यांचा समज असतो.

पण टायटल्स बघणंही बर्याच वेळा खुप इंटरेस्टिंग असतं. उदाहरणार्थ.. शोले. त्याची टायटल्स.. त्यावेळचं आरडीचं म्युझिक.. सगळंच अफलातुन होतं.

पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यातुन बरीच वेगळी, रंजक माहिती आपल्याला मिळत असते. नवकेतन फिल्मस् ही देव आनंद, विजय आनंद यांची निर्मिती संस्था. त्यांच्या काही चित्रपटाच्या टायटल्स मध्ये.. उदा. गाईड.. ज्वेलथीफच्या टायटल्स मध्ये निर्मिती व्यवस्थापक म्हणून नाव येते यश जोहर यांचे.

काही काळाने मग याच यश जोहर यांचे टायटल्स मध्ये नाव झळकते ते ‘निर्माता’ म्हणून. आणि तो चित्रपट असतो.. दोस्ताना.

असेच एक निर्माते.. बोनी कपुर. त्यांचा चित्रपट सुरु होण्याआधी.. टायटल्सच्याही आधी स्क्रीनवर फोटो येतो.. गीताबालीचा. बोनी कपुर, अनिल कपुर यांचे वडील म्हणजे सुरींदर कपुर. फार पुर्वी ते या क्षेत्रात नवीन असताना गीताबालीचे सेक्रेटरी म्हणून काम करत. त्यावेळी गीताबालीने त्यांना खुप मदत केली होती. त्याची जाण ठेवून त्यांच्या प्रत्येक चित्रपटाची सुरवात होते ती गीताबालीच्या प्रतिमेपासुन.

अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांनी अनेक चित्रपटातुन एकत्र कामे केली. त्यावेळी विनोद खन्नाचा आग्रह असे.. टायटल्स मध्ये अमिताभ पुर्वी त्याचे नाव यावे.. कारण तो सिनिअर होता. पण कधी त्याचे ऐकले जायचे.. कधी नाही.

संगीतकार कल्याणजी आनंदजी यांच्याकडे सहाय्यक म्हणून लक्ष्मीकांत प्यारेलाल काम करायचे.. अगदी सुरुवातीच्या काळात. त्यावेळी टायटल्स मध्ये लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या नावालाच स्वतंत्र फ्रेम मिळावी असा कल्याणजी आनंदजी यांचा आग्रह.. आणि मोठेपणाही. नावात महत्त्व मिळाल्याने उमेद मिळते.. विश्वास वाढतो असं त्यांना वाटे.

आपल्या मुलाला.. म्हणजे कुमार गौरवला लॉंच करण्यासाठी राजेंद्र कुमारने चित्रपट बनवला.. लवस्टोरी नावाचा. त्याचा दिग्दर्शक होता.. राहुल रवैल. चित्रपट पुर्ण होत असतानाच निर्माता या नात्याने.. आणि वडील याही नात्याने राजेंद्र कुमारने काही बदल सुचवले. पण राहुल रवैलनै त्याला स्पष्ट नकार दिला. त्याचा राग मनात धरुन मग राजेंद्र कुमारने टायटल्स मधुन त्याचे नावच कट केले. ‘लवस्टोरी’ पडद्यावर झळकला.. पण दिग्दर्शकाच्या नावाविनाच.

‘नावात काय आहे?’ असं म्हणतात सगळेजणंच.. पण नावात खुप काही आहे.. किंबहुना नावातच सर्व काही आहे हेही सगळेजण जाणतात.

आणि हे जाणुन होता काशिनाथ घाणेकर. आपल्या नाटकाच्या श्रेयनामावलीत.. आणि थिएटरमध्ये होणाऱ्या अनाउंन्समेंटमध्ये आपले नाव सर्वात शेवटी यावे हा आग्रह त्याने शेवटपर्यंत ठेवला. थिएटरमधील अनाउन्समेंट मध्ये तर आपले नाव ऐकण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता.. आतुरता पहाण्यासाठी तो स्वतः आतुर असे. सर्व कलाकारांची नावे सांगुन झाल्यावर.. शेवटी मग नाव येई..

“… आणि डॉ. काशिनाथ घाणेकर. “

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ झोका… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

☆ झोका… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

“ताई गुणाची माझी छकुली,

झोका दे दादा म्हणून लागली! ‌‌

सांभाळ ताई फांदी वाकली,

दोन्ही दोऱ्यांना गच्च आवळी! “

माझा मोठा मुलगा लहान असताना दोनच वर्षांनी झालेल्या त्याच्या धाकट्या बहिणीला झोका देताना हे गाणं म्हणत असे! त्याचे ते गोड, थोडेसे बोबडे शब्द ऐकताना मला खूप छान वाटत असे!

प्रत्येक लहान मुलाला झोक्याचं खूप आकर्षण असतं. अगदी छोटं असताना पाळण्यात झोपलेल्या बाळाला झोके देताना मनामध्ये उठणारे वात्सल्याचे तरंग बाईला अनुभवता येतात! झोक्याच्या तालावरती गाणं म्हणताना, अंगाई गीत गाताना आईला होणारा आनंद अवर्णनीयच असतो. हा तर मोठेपणचा अनुभव!

पण आपल्या प्रत्येकाचं बालपण हे असं झोक्याशी बांधलेलं असतं! प्रथम पाळणा, नंतर झुला, झोपाळा 

यावर झुलता झुलता आपण कसं मोठं होतो कळतच नाही! माझ्या आठवणीतलं अजूनही आजोळी गेल्यावर माजघरात बांधलेला झोपाळा हे माझं आवडतं ठिकाण होतं! मामाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपाळ्याचे झोके किती वर्ष घेतले असतील हे आठवलं की अजूनही वाटतं तो बालपणीचा झोपाळा आपला खरा सवंगडी आहे! सुदैवाने अजूनही वयस्कर असलेला माझा मामा आजोळी गेले की हे लाड पुरवतो!

… आपल्या मनाची स्पंदनं म्हणजे एक लयबद्ध झोका असतो. मनात उमटणारे विचार तरंग एखाद्या झोक्याप्रमाणे लयबद्धपणे मागेपुढे होत राहतात. आणि आपोआपच मूड चांगला येतो… आणि लिखाण होते. माझ्या बाल्कनीत बांधलेला झोका हा माझा खूप आवडता आहे. तिथून दिसणारे मोठे ग्राउंड, तिथे असणारी गुलमोहराची झाडे तसेच बहाव्याची आणि इतरही मोठी झाडे, त्यावर बसणारे पक्षी, वरचेवर होणारे भारद्वाजाचे दर्शन हे सर्व माझे झोक्यावरून दिसणारे साथीदार आहेत….

“खोप्यामध्ये खोपाबाई सुगरणीचा चांगला… ” या गीतात बहिणाबाई सुगरणीच्या खोप्याचं वर्णन करतात आणि तो झाडाला टांगलेला कसा असतो तो आपल्या नजरेसमोर उभा राहतो. अशी झुलणारी त्यांची घरं पाहिली की खरोखरच तो झाडाला टांगलेला बंगलाच वाटतो!

फार पूर्वी प्रत्येक घराला एक झोपाळा असेच असे. दुपारच्या वेळी घरातील एखादे आजी आजोबा त्या झोपाळ्यावर विश्रांती घेत असत, तर संध्याकाळच्या वेळी घरातील बालगोपाळांना झोक्यावर बसून परवचा, पाढे, शुभंकरोती म्हणण्यासाठी जोर येई! झोक्याच्या तालावर आणि वेगावर मोठमोठ्याने पाढे म्हणण्यात खूप मजा येत असे.. हळूहळू घरं लहान झाली आणि हा माजघरातला झोपाळा दिसेनासा झाला!

मग कुठे लहान बाळासाठी दाराला बांधलेला छोटासा झोका दिसे किंवा झोळी बांधलेली असे… हे आपलं दुधाची तहान ताकावर भागवल्यासारखं वाटे!

पूर्वीच्या काळी मोठ्या वाड्यातून पितळी कडी असलेला सागवानी झोपाळा म्हणजे घराचे वैभव असे.

घरात मोठी माणसं नसली की स्त्रिया झोपाळ्याचा आनंद घेत. एरवी झोपाळा म्हणजे घरातील मोठ्या माणसांचे विरंगुळ्याचे ठिकाण आणि ते नसतील तेव्हा लहान मुलांचे बागडायचे हक्काचं स्थान!

मनामध्ये येणाऱ्या विचारांचं वर खाली येणं हा तर मनाचा झोका! त्याची आवर्तन किती उंच जातील सांगता येत नाही. ‘आता होता भुईवर, भेटे आभाळाला’असं त्याचं अस्तित्व!

“एक झोका… एक झोका.. चुके काळजाचा ठोका, एक झोका…. “

“.. चौकट राजा” या सिनेमात स्मिता तळवलकर यांनी या झोक्याचा कथेसाठी फार सुंदर उपयोग करून घेतलेला आहे!

एखाद्या छोट्या अपघातामुळे एखाद्याचे आयुष्य कसे बदलून गेले, ही गोष्ट त्या सिनेमांमध्ये इतकी आर्ततेने दाखवली आहे की संपूर्ण चित्रपट भर ती झोक्याची आंदोलनं मनामध्ये फिरत राहतात! अजूनही आठवणीतल्या सिनेमांमध्ये हा दिलीप प्रभावळकर आणि स्मिता तळवलकर यांचा झोका रुतलेला आहे…

नागपंचमीचा झोका हा पूर्वीपासूनच मुलींच्या खेळाचे आवडते ठिकाण असे. अजूनही लहान गावातून खेड्यापाड्यातून झाडाला मोठे-मोठे झोके बांधून झोके खेळले जातात, त्यामुळे मनाला तर आनंद मिळतोच पण आपली शारीरिक क्षमता ही वाढवली जाते! नागपंचमी च्या 

निमित्ताने माझा मनाचा झोका ही मस्त झोके घेऊ लागला आणि एकेका झोक्याबरोबर आठवणी ही मनात झुलू लागल्या…

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares