मराठी साहित्य – विविधा ☆ || जय गिरनारी – एक यात्रा || ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? विविधा ?

☆|| जय गिरनारी – एक यात्रा || ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

(1) ‘गोरख’शिखर, ‘गुरु’शिखर  आणि ‘अंबा माता’ शिखर (घंटा) (उजवीकडून डावीकडे) (2) सोमनाथ मंदिर (समोर सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा दिसत आहे)

गुजरातमधील ‘सोमनाथ’ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक देवस्थान आणि ‘गिरनार’ हे दत्तात्रेयांचा वास असलेले जागृत गिरीस्थान हयापलीकडे मला दोन्हीबद्दल कणमात्रही माहिती नव्हती.  बरेच लोक तिकडे जाऊन आल्यावर त्यांच्याकडून काही माहिती कानी पडायची “खूप भारी आहे…” वगैरे.  पण ती तितक्याच त्वरेने एका कानाने ऐकून दुसर्‍या कानाने विसरून जायची. काही वर्षांपूर्वी माझी आई व आत्या ‘सोमनाथ’ला जाऊन आल्यामुळे तिकडील काही फोटो पहायला मिळाले होते. परंतु मी स्वत: कधी उठून तिकडे जाईन असे कधी वाटले नव्हते… तेही एप्रिलच्या रणरणत्या उन्हाळ्यात आणि तेही सुट्टीच्या सीजनला, रेल्वेची टिकीटे सर्व फुल्ल असताना आयत्या वेळेला बुकिंग करून…

पण म्हणतात ना, योग जर असेल तर सर्व गोष्टी आपोआप जुळून येतात. आमचेही थोडेफार असेच झाले. रेल्वेची प्रतीक्षा यादीत खोलवर असलेली तिकिटे अगदी आदल्या दिवशी RAC / CNF होत गेली आणि पाहतापाहता मित्र गणेश दाबक, धनंजय जोशी हयांसोबत मी बुधवार १३एप्रिल रोजी रात्रौ ८:३० च्या पुणे-अहमदाबाद रेल्वे मधून निघालो सुध्दा…

सकाळी ७:३० ला अहमदाबाद स्टेशन आल्यावर फलाटावरील स्टॉल वर ताजा ढोकळा, त्यावर गोडसर कढी, सामोसे आणि चहा असा चविष्ट नाष्टा झाला. तासाभराने जबलपूरहून आलेल्या ‘सोमनाथ’ च्या ट्रेन मध्ये बसलो. जूनागढ स्टेशन जवळ येत असतानाच आम्हाला गिरनार शिखरांचे “दुरून डोंगर साजरे” असे छान दर्शन झाले. आकाशात उंचचउंच घुसलेली शिखरे बघून खरे तर छाती दडपून गेली होती.

संध्याकाळी ६ वाजता सोमनाथला पोहोचलो.  छोट्या टुमदार रेल्वे स्टेशनातून रिक्षाने बाहेर पडल्यावर एक म्हातारा रिक्षावाला सामोरा आला. तो जरा नियम पळून सावकाश रिक्षा चालवेल ह्या विचाराने त्याच्याबरोबर बाहेर आलो. त्याची रिक्षाही जवळपास त्याच्याच वयाची होती. पण गियर टाकून सुरुवातीलाच बुवांनी मेन रोड वर ट्राफिकच्या उलट दिशेने रिक्षा वळवल्यावर आमच्या भुवया वर गेल्या. दहा मिनिटातच सोमनाथ मंदिराच्या मागील ‘कृष्णा’ हॉटेलमध्ये मुक्कामी पोहोचलो.

(1) सोमनाथचा समुद्रकिनारा व डाईक्स (2) १०,००० किमी समुद्र असल्याचे दर्शवणारा बाणस्तंभ

चहा-आंघोळ आवरून मंदिरात पोहोचेपर्यंत ‘सोमनाथा’ची आरती सुरू झाली होती. मोठ्या आवाजात ढोल लयबद्ध वाजत होते, त्यामुळे मंदिरात एक वेगळेच वातावरण निर्माण झाले होते.  शेवटीशेवटी द्रुत लयीत गजर होऊन आरती संपली.  संध्याकाळाचा छान समुद्री वारा खात आम्ही त्या विस्तीर्ण मंदिराभोवती एक फेरफटका मारला.  तिथेच आम्हाला ‘दिशादर्शक बाण’ पहायला मिळाला जो हिन्दी महासागरात १०००० किलोमीटर जमीन नसल्याचे दर्शवितो. गर्दी असूनही सगळीकडे निखालस स्वच्छता आणि चोख व्यवस्था होती.

आरतीनंतर मंदिरामागेच ‘लेजर शो’ झाला ज्याला दमदार commentary दस्तूरखुद्द अमिताभ बच्चन ह्यांची होती. पुराणकाळापासून ते सोन्याचांदी-हिरेमाणकाने मढवलेले सर्वात वैभवशाली मंदीर बनेपर्यंत पासून ते गझनीचा मुहम्मद व इतर मुघल आक्रमकांनी अनेकवेळा लुटलेले, ते आधुनिक काळापर्यंत पुनर्बांधणी करून सरदार पटेलांनी उभारलेले, असा सर्व चित्र-इतिहास जवळजवळ सहा-सात मजले उंच अशा त्या भव्य मंदिरावरच लेझर ने प्रोजेक्ट केलेला पाहणे आणि ऐकणे हा खूपच छान अद्भुत अनुभव होता…कुणीही चुकवू नये असा!

‘लेजर शो’ संपल्यावर आम्ही शंखांच्या दुकानात फिरायला गेलो. चांगल्या शंखांच्या किमती रु. १३००-१५०० च्या पुढेच होत्या. आत्ताच खरेदी केला आणि नंतर घरी रोजच्यारोज वाजवला नाही तर बायको शंख करेल, अशी एक भीतीही मनाला चाटून गेली. कधीकाळी दक्षिणेत ‘रामेश्वर’ला जाऊ तेव्हा सस्त्यात खरेदी करू, असे मनाशी ठरवून विचार रद्द केला. 

दुसर्‍या दिवशी सकाळी उठलो आणि आवरून होटेलच्या मागेच असलेले अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले मूळ दगडी शिवमंदीर पहायला गेलो. दर्शन घेऊन परत येताना छोट्या गल्लीमधील एका नाश्त्याच्या गाडीवर थांबून जिलेबी, ढोकळा, फाफडा असा फक्कड गुजराती नाश्ता केला.

हॉटेल मालकास एव्हाना सुपरिचित असलेल्या धनंजय जोशींनी (त्यांची ही २८ वी गिरनार भेट होती!) आदल्या दिवशी ठरवल्याप्रमाणे ठीक ११ वाजता ‘बाबू’ रिक्षावाला हॉटेलात हजर झाला.  आम्हा तिघांना घेऊन मग त्याने जवळपासच्या मंदिरांचा फेरफटका मारून आणला. त्यामध्ये ‘त्रिवेणी संगम’, ‘गोलकधाम मंदीर’, ‘सूर्य मंदीर, ‘हनुमान मंदीर, ‘श्रीराम मंदीर, ‘शशीमोचन महादेव’, ‘पाटण प्रभास’, ‘भालका तीर्थ’ ह्यांचा समावेश होता.

(1) ‘अंबा माता’ मंदिर (2) श्रीकृष्ण चरण पादुका (3) भालका तीर्थ (क्षमायाचक भिल्लास अभय देताना श्रीकृष्ण)

कपिला, हिरण आणि सरस्वती (लुप्त) ह्या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर घाट आहे आणि काही sea gull पक्षी उडत होते. ते सूर मारून तुमच्या हातातील खाऊ उचलून नेतात. त्यांना भरवण्यासाठी आम्ही बिस्किटेही घेतली पण उन्हे वाढली असल्याने पक्ष्यांनी आमच्याकडे चोचही न फिरवून सपशेल दुर्लक्ष केले. मग तिथल्याच एका धष्टपुष्ट गीर गाईला आम्ही बिस्किटे खिलवून टाकली.  

‘गोलकधाम मंदीर’ इथून हिरण नदीचे छान दर्शन घडते. इथे श्रीकृष्ण मंदिरामध्ये गीतेचे संपूर्ण अठरा अध्याय कोरलेले आहेत. ह्यास्थानी भगवान श्रीकृष्णांनी मृगयेस आलेल्या भिल्लाच्या हातून स्वत:च्या पावलास तीर मारवून घेऊन आपला अवतार समाप्त केला, अशी आख्यायिका आहे. इथे त्यांच्या चरण पादुका आहेत. तसेच बंधू बलरामांनीही इथे आपला अवतार समाप्त केला असे मानतात. मागल्या बाजूस श्रीकृष्ण आणि बलराम यांचे पाळणाघरही बघायला मिळते.

इथून पुढे सूर्यमंदीर पाहून आलो. बर्‍यापैकी मोडकळीस आलेले दिसले. एकंदरीत सर्व जी मंदिरे होती ती पुराणकाळातील आख्यायिकांशी निगडीत आणि जुनी  होती. श्रीराम मंदीर आणि ‘भालका तीर्थ’ फक्त आधुनिक काळातील बांधलेले वाटले.  असो.

‘भालका तीर्थ’ इथून रिक्षा पळवली ती थेट सोमनाथ रेल्वे स्टेशन कडे. १२:३० च्या रेल्वे ने निघून अडीच तासांत आम्ही पोहोचलो ते जुनागढला. हॉटेल ‘मंगलम’ इथे छान गुजराती थाळी जेवून थोडा वेळ हॉटेल रूममध्ये विश्रांति घेतली. आमच्या हॉटेल रूममधून ‘उडनखटोला’ (मराठीत ‘रोप वे’) वर-खाली करताना दिसत होते. आम्हाला आता पुढील वेध लागले होते ते म्हणजे ‘गिरनार’चे चढाईचे…

संध्याकाळी साडेचारच्या सुमारास आम्ही हॉटेल लॉबीमध्ये जमलो. बाहेरच ट्रेकिंगसाठी काठ्या भाड्याने मिळाल्या. त्या घेऊन जवळच असलेल्या सुसज्ज अशा उडनखटोलाच्या तळस्थानकाला चालत पोहोचलो. मात्र तिथे सिक्युरिटीने आमच्या ब्यागांमधील पाण्याच्या सर्व बाटल्या काढून फेकून द्यायला लावल्या.  अर्थात आतमध्ये पाण्याच्या बाटल्या विकत मिळत होत्या.J लवकरच उडनखटोलाच्या पाळण्यात बसून आम्ही झर्रकन निघालो. चांगल्यापैकी वेगाने खेचत वरवर जात होतो.  खालून पायर्‍यांचा मार्ग दिसत होता अर्थात ह्या वेळेस फारसे कुणी दिसले नाहीत.

साधारण दहा-बारा मिनीटातच आम्ही ‘अंबा माता’ मंदिरापाशी पोहोचलो. फारशी गर्दी नसल्याने छान दर्शन झाले. खाली जाणार्‍यांसाठी सहा वाजता पाळण्याची शेवटची फेरी असल्याचे स्पीकरवर ओरडून सांगत होते.

प्रथम पंक्ति (1) उडनखटोलेवाले राही (2) गोरख शिखरावरून दिसलेले गुरुशिखर, मागे लक्ष्मी शिखर, तळाशी धुनी आणि आकाशात पौर्णिमेचा चंद्र

द्वितीय पंक्ति (1) गुरुशिखर (2) चंद्र आहे साक्षीला (3) पुणेकर ‘गिरनारी’ कुटुंबीय

वीसपंचवीस मिनीटानी आम्ही पुढील म्हणजे ‘गोरख’ शिखराकडे निघालो. इथे वारा एकदम भन्नाट होता, त्यामुळे उकाडा अजिबात जाणवत नव्हता. साधारण अर्ध्या-पाऊण तासात आम्ही तिथे पोहोचलो. गोरखनाथांचे वास्तव्य असल्याने ह्या स्थानाला विशेष महत्व आहे. इथे एक धुनी कायम प्रज्वलित असते. इथेच आम्हाला घोलप नावाचे चिंचवडला राहणारे एक भक्त भेटले. ते आले की तीन-तीन महीने इथे यात्रिकांच्या सेवेसाठी म्हणून शिखरावर वास्तव्याला असतात. बोलताबोलता त्यांनी ‘गुरुशिखरा’चा उल्लेख ‘हेडक्वार्टर’ असा केला ते विशेष वाटले.

पुढे गुरुशिखराकडे प्रयाण केले. ह्या पायर्‍या प्रथम खाली उतरून नेतात आणि मग गुरुशिखराकडे चढत नेतात. अर्थात इथेही एखाद्या गडावर बघायला मिळतो त्याप्रमाणे पायर्‍यांच्या कडेला भक्तमंडळींनी प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्या टाकून कचरा केलेला दिसत होताच. एव्हाना संध्याकाळ व्हायला लागली आणि पायर्‍यांच्या बाजूचे दिवे उजळल्याने पुढची मार्गक्रमणा सोपी झाली. शिवाय थोड्या वेळात पौर्णिमेचा चंद्र उगवल्याने शिखरे प्रकाशमान दिसू लागली.

 ‘गुरुशिखरा’पाशी पोहोचायला साधारण एक तास लागतो. सुदैवाने इथेही फारशी गर्दी नसल्याने ‘चरण पादुकां’चे पाच-एक मिनिटे शांत आणि पवित्र वातावरणात छान दर्शन घडले.  हा आमच्या यात्रेचा मिटल्या डोळ्यांनी आपले अस्तित्व विसरायला लावणारा, एक विलक्षण आनंदाची अनुभूती देणारा क्षण होता. मंदिरातील साधूने कपाळाला गंध लावल्यावर आम्ही मंदिरातून बाहेर पडलो व पायर्‍या उतरायला लागलो.  तिथेच जगन्नाथपुरी वरून आलेले एक जटाधारी ‘चिलीम’ साधू भेटले. त्यांच्याशी आध्यात्मिक, राजकीय, रशिया-युक्रेन युध्द, पुरीचे मंदीर, भविष्य अशा विविध विषयांवर काही विलक्षण गप्पा झाल्या.

तिथून मग परतीच्या प्रवासास सुरुवात केली. तत्पूर्वी एक टप्पा पार करायचा होता तो म्हणजे ‘धुनी’.  ह्यासाठी मधूनच दुसरीकडे पायर्‍या उतरून जावे लागते. 

उतरायला सुरुवात केली आणि तेवढ्यात आमच्या मागून कुणीतरी धडपडल्याचा आणि पाठोपाठ बायका ओरडल्याचा आवाज आला. वर जाऊन पहिले तर आमच्याबरोबरच्या कुटुंबातील बाई आणि त्यांची आठ-नऊ वर्षांची मुलगी अशा दोघी पाय सटकून चांगल्या दहा-बारा पायर्‍या गडगडत खाली आल्या होत्या. मुका मार चांगलाच लागला होता पण सुदैवाने कुणाला हाड फ्राक्चर वगैरे काही झाले नव्हते. त्यांना मग ‘धुनी’पर्यन्त उतरवले आणि तिथे थोडा प्रथमोपचार मिळाला.  धुनीचे दर्शन घेऊन मग तिथेच जेवण-वजा प्रसाद घेतला.  आता अंधारात परंतु दिव्यांच्या प्रकाशात परतीचा प्रवास करायचा होता तो ‘गोरख शिखर’ आणि नंतर ‘अंबा माता’ मंदिरांकडे.

गणेश आणि मी त्या मायलेकींना काठीचा आधार देत सर्वांच्या पुढे निघालो.  आणि बोलण्यामध्ये गुंतवत असे उतरवले की त्यांना वेदनेचा विसर पडावा. शक्यतो न थांबता उतरत राहिलो. गोरख शिखरापाशी पोहोचल्यावर एक चहावाला सर्वांना सेवा म्हणून चहा देत होता. आता उतरणार्यान्पेक्षा चढणार्‍यांची संख्या वाढू लागली होती. परंतु कुठेही गर्दी होत नव्हती की ढकलाढकलीही होत नव्हती. एकमेकांना “जय गिरनारी” असे प्रोत्साहन देत सर्वजण उत्साहात पायर्‍या चढत किंवा उतरत होते. वाटेत पाण्याचे बाटल्या, लिम्बू सरबत,चहा-कॉफी वगैरेंची दुकाने लागतात त्यामुळे थकावट दूर होत होती. वृद्ध, वयस्कर  मंडळींना पायर्‍या चढणे सोपे नव्हते पण तरीही निर्धाराने सर्वजण चालत होते. यात्रिक मंडळी बरीच मुंबई –पुण्याकडची असल्याने कानावर मराठीच जास्त पडत होते. मुंबईमधील एक दाम्पत्य त्यांच्या तरूण पण आंधळ्या मुलीला घेऊन आले होते. वडिलांच्या पाठीमागून त्यांच्या खांद्यावर हात ठेवून ती पायर्‍या उतरत होती.  मात्र उन्हामुळे व अतिश्रमामुळे कदाचित तिला पित्ताचा त्रास व्हायला लागला. दुकानासमोरच्या एका बाजेवर निजवल्यावर तिला बरे वाटले.

आम्हाला ‘अंबा माता’ मंदीरापासूनच्या  ५००० पायर्‍या उतरायला जवळपास चार तास (रात्रीचे १०:४० ते पहाटे २:४०) लागले.  पायाचे आणि पावलांचे अगदी तुकडे पडायची वेळ आली होती. संध्याकाळी हेच अंतर पाळण्यात बसून अगदी आरामात दहा मिनिटात चढून गेलो होतो.  होटेलात पोहोचलो तेव्हा कपडे घामाने चिंब ओले झाले होते. मस्तपैकी शॉवर घेऊन असे काही गुडुप्प झोपलो की बस्स! J

दुसर्‍या दिवशी १२:३० वाजताची वेरावळ-पुणे गाडी पकडायची होती. तत्पूर्वी जुनागढ मध्ये गुजरातची प्रसिद्ध अशी बांधणीची कापडे घेण्यासाठी गावात खरेदीला जायचे ठरवले. अस्खलित गुजराती बोलू शकणारा गणेश बरोबर असल्यामुळेच आम्ही हा बेत ठरवला. ‘कापड खरेदी’ म्हटल्यावर जावा-नणंदांची जोडीही आमच्याबरोबर यायला तयार झाली. गणेशने मग एका रिक्षावाल्याला गाठले आणि त्यासोबत काहीतरी ‘गुज्जु-गोष्टी’ करून त्याला पटवले. जुनागढ गावच्या बाजारातील एका गल्लीत तो आम्हाला घेऊन गेला. तिथे अर्ध्या-पाऊण तासात मनासारखी कापड खरेदी झाली. इथेही गणेशच्या ‘गुज्जु-भाषा’ ज्ञानाचा आम्हाला किमतीत घासाघीस करण्याकामी भरपूर फायदा झाला. मग रिक्षा रेल्वे स्थानकाकडे भरधाव पळवली. रेल्वे गाडी थोडी उशिरानेच आली.  पुढील ‘पुणे’ प्रवासात आम्हाला काही ‘उणे’ पडले नाही. J

आयुष्यात “जय गिरनारी” म्हणून एकदा का ह्या पवित्र, निसर्गसुंदर गिरीस्थळी जाऊन आलात की तेच तुम्हाला पुन्हा पुन्हा बोलावत राहते असा अनेकांचा अनुभव आहे. पुढील बोलावणे कधी येतेय ह्याची आम्हीही आतुरतेने वाट पाहतोय!

©  विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संगीत ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

 ☆ संगीत ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“संगीत !”

“संगीत” आवडत नाही असा माणूस मिळणे विरळाच ! हां, आता व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने कोणाला काय आवडेल आणि काय नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न झाला. कोणाला कंठाळी संगीत पसंत असते तर कोणी शांत सुमधुर संगीतात रमतो ! मुळ मुद्दा काय, तर वेगवेगळ्या  प्रकारचे “संगीत” हा आपल्या जीवनाचा अविभाज्य  भाग आहे, हे आपण पण मान्य कराल.

मला स्वतःला vocal classical किंवा instrumental संगीत त्यातल्या त्यात जास्त आवडते.  पण तुम्ही जर मला विचारालं की हा “राग” कोणता ते ओळख, तर मी पार निरुत्तर होतो ! तसा एक प्रकारे मी कान सम्राटच जास्त आहे म्हणा ना !

मध्यंतरी संगीतातील जाणकार असलेल्या माझ्या एका नातेवईकांच्या घरी जाण्याचा प्रसंग आला. त्यांच्याकडे जुन्या classical LP रेकॉर्डस पासून कॅसेट, सीडी यांचा नुसता खजिनाच आहे. मी सहजच गप्पा मारता मारता हाताला लागलेली एक सीडी चालू केली आणि पुन्हा गप्पांकडे वळलो.  गाणे सुरू झाले आणि ते गप्पा मारता मारता मधेच थांबले आणि मला म्हणाले “अरे प्रमोद, हा सकाळचा राग आहे आणि आता संध्याकाळ असल्याने आपण संध्याकाळच्या एखाद्या रागाची सीडी लावूया !”

मला थोडा “राग” आला. पण वर म्हटल्या प्रमाणे मी फक्त कान सम्राट असल्याने मला तो फरक समजला नाही. यात माझी त्यांच्या दृष्टीने शंभर टक्के चूक असली, तरी ते “संगीत” मला स्वतःला, जर “त्या वेळेस” आनंद देत असेल, तर मी ते का ऐकू नये असा प्रश्न पडला ! असो !

प्रत्येकाची आनंद उपभोगायची व्याख्या वेगवेगळी असते आणि ती तशी असणे निसर्ग नियमाला धरूनच आहे !  ती जर का सगळ्यांची एकच असती, तर सगळ्यांचेच  आयुष्य एक सूरी झाले असते, होय की नाही ?

खरे पाहिले तर या चराचरात अनेक प्रकारचे आवाज काही ना काही कारणाने कायम निर्माण होत असतात. त्या आवाजातून सुद्धा कोणी नाद संगीत शोधण्याचा प्रयत्न सतत करीत असतो, असं माझं स्वतःच मत आहे !

एव्हढेच कशाला रिकामे पत्र्याचे डबे, लाकडी खोकी यातून सुद्धा नाद संगीत निर्माण होऊ शकते आणि त्याचे प्रत्यंतर आपण आपल्याकडील जगप्रसिद्ध तबला वादकांच्या भावाकडून, कधी नां कधी घेतले असेलच !

नुकताच सिंगापूरला जाण्याचा योग आला होता.  तिथे नेहमी प्रमाणे पहाटे फिरायला गेलो असता दोन पक्ष्यात चाललेला “संगीत रूपी” संवाद, हो खरोखर त्याला संवादच म्हणावे लागेल, तो ऐकतांना मी भान हरपून एका जागी किती तरी वेळ ऊभाच होतो !  त्यांतून येणारी एक प्रकारच्या  “नाद संगीताची” मला जाणवणारी अनुभूती, माझे मन मोहरवून जात होती !

माझे असे ठाम मत आहे, की या जगात ठायी, ठायी, जिकडे तिकडे, “संगीत” तच “संगीत” भरलेले आहे ! फक्त ते ऐकण्यासाठी आपण आपले कान “तयार” करण्याची गरज आहे, म्हणजे मग त्यातून आपल्याला मिळणारा आनंद हा खरोखरच स्वर्गीय असेल या बद्दल मला खात्री आहे !

एकूण काय, तर प्रत्येकाने आपल्या वाट्यास आलेल्या जीवनात, ते जगत असतांना, त्यातील “नाद संगीत” शोधत शोधत, जीवनाचा आनंद घेत घेत आयुष्य जगले, तर सर्वांचेच कल्याण होईल !

आपले जीवन कायम संगीतमय राहो हीच मनोकामना !

© प्रमोद वामन वर्तक

२९-०७-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डोळ्यांतले पाणी…भाग 1 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ डोळ्यांतले पाणी…भाग – 1 ☆ सौ. अमृता देशपांडे  

मला आज लिहायचं आहे

” डोळ्यातले पाणी ” या विषयावर.  आश्चर्य वाटलं ना! रडणं म्हणजे नकारात्मक वृत्तीचं आणि भावनांचं प्रकटीकरण.  धैर्य, पराक्रम,  सकारात्मक विचार,  सहिष्णुता,  हास्य या सर्वापुढे

‘ रडणं ‘ ही एक हलक्या किंवा खालच्या दर्जाची वृत्ती,  असा सर्वसाधारण समज.  रडणे या क्रियेशी संबंधित जेवढे काही वाक्प्रचार आहेत,  ते त्या क्रियेची अनावश्यकता आणि दुर्लक्षितता व्यक्त करतात .

” हिची रड काही संपत नाही” , ” जरा काही झालं की लागला मुळूमुळू रडायला “, ” अरे, पुरूषासारखा पुरूष तू, आणि रडतोस?” अशी अनेक वाक्ये आहेत.  त्यामुळे रडणं हे मनाचा कमकुवतपणा दर्शवितं  अशी पूर्वीपासून समजूत रूढ झाली आहे.

खरंतर ‘ रडणं ‘ किती नैसर्गिक आहे.  ” हसणं ” या प्रकारात स्मितहास्य,  हास्याचा गडगडाट, गालातल्या गालात हसणे, खुक् कन हसणे, खुद्कन हसणे, असे विविध पोटप्रकार आहेत. तसंच, रडणं किंवा डोळ्यातलं पाणी  यालाही अनेक नावे आहेत. अश्रू पाझरणे, आसवं गाळणे, टिपं गाळणे, गंगाजमुना,  डोळे वहाणे,  डोळे डबडबणे,  इत्यादि….

माणसाच्या मनाचा आरसा म्हणजे त्याचे डोळे. डोळे जितके पारदर्शी,  तितकंच डोळ्यातलं पाणी ही पारदर्शी असतं. डोळ्यातले पाणी म्हणजे मनातल्या भावनांचं न लपवता येणारं अदृश्य रूप. मग त्या भावना दुःखाच्या असोत वा आनंदाच्या,  कौतुकाच्या असोत वा कृतार्थतेच्या,  यशाच्या असोत वा अपयशाच्या,  प्रेमाच्या असोत किंवा संतापाच्या, उपकाराच्या असोत वा लाचारीच्या, भूतकाळाशी निगडीत असोत किंवा वर्तमानाशी, विरहाच्या असोत वा पुनर्मीलनाच्या.  मनातल्या या सगळ्या भावनांच्या कल्लोळाचं सदृश्य रूप म्हणजे डोळ्यातले पाणी.  कधी कधी भावनांच्या दाटून आलेल्या उमाळ्यापुढे व्यक्त होताना शब्द कमी पडतात, ते काम अश्रू करतात.

(क्रमशः… प्रत्येक मंगळवारी)

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग- २८ – परिव्राजक – ६. देवभूमी ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग- २८ – परिव्राजक – ६. देवभूमी ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

जवळ जवळ अडीचशे किलोमीटर ची आडवी पसरलेली हिमालयची रांग, सव्वीस हजार फुट उंचीवरचे नंदादेवी चे शिखर असा भव्य दिसणारा देखावा बघून स्वामीजी हरखून गेले. त्यांनी हिमालयाचे असे दर्शन प्रथमच घेतले होते. मध्यभागी नैनीतालचे शांत आणि विस्तीर्ण सरोवर त्याच्या काठावर वसलेली वस्ती, आणि सर्व बाजूंनी डोंगर उतारावर असलेले शंभर फुट उंचीचे वृक्षांचे दाट असे जंगल. नैनीतालच्या कुठल्याही भागातून दिसणारे हे नयन मनोरम आणि निसर्गरम्य दृश्य भुरळ घालणारे होते.

नैनीतालहून अल्मोर्‍याला त्यांचा पायी प्रवास सुरू झाला. सर्व पहाडी प्रदेश. निर्जन रस्ता, तुरळक भेटणारे यात्रेकरू, गंभीर शांततेत फक्त पक्षांचा सतत कानावर पडणारा किलबिलाट, असा एक डोंगर झाला की दुसरा पार करायचा. रस्त्यात एखाद दुसरं दुकान दिसायचं. पण पैसे जवळ नसल्यानं त्याचा असूनही उपयोग नाहीच. कुणी दाता रस्त्यात भेटला आणि त्याने काही दिले तरच खायला मिळणार. धर्मशाळाही खूप कमी होत्या तेंव्हा. त्यामुळे संध्याकाळ झाली की जिथे अंग टाकायला मिळेल तिथे थांबायचं. असा हा अवघड प्रवास एक तपश्चर्याच होती. या अडचणीं चा विचार केला तर, आज आम्ही हॉटेल्स, गाड्या, साइट सींग चे घरूनच बुकिंग करून निघतो. सतत मोबाइल द्वारे संपर्कात असतो. अडचण नाहीच कशाची. तरीही आपण त्या ठिकाणी /शहर/देश बघायला गेलो की तिथे आपल्याला काय बघायचं हेच माहिती नसतं. फक्त मौज मजा, खाद्याचा आस्वाद आणि खरेदी आणि महत्वाचं म्हणजे फोटो प्रसिद्धीची हाव. असो, अशा प्रकारे स्वामीजी आणि अखंडानंद यांना अडचणींचा विचार सुद्धा डोक्यात नसायचा. आध्यात्मिक प्रेरणा मात्र होती.

नैनीताल सोडल्यानंतर तिसर्‍या दिवशी दोघं काकरीघाट इथं झर्‍याच्या काठावरील पाणचक्की जवळ मुक्कामास थांबले. तिथून अल्मोरा पंचवीस किलोमीटर होतं. दोन नद्यांचा संगम, काठावर मोठं पिंपळाचं झाड, प्रसन्न वातावरण अवर्णनीय शांतता, वनश्री बघून स्वामीजी भारावून म्हणाले, “ध्यानस्थ बसण्यासाठी ही जागा किती सुंदर आहे.”

आणि काय पिंपळाच्या झाडाखाली आसनास्थ होऊन स्वामीजींनी डोळे मिटून घेतले. काही क्षणातच त्यांचे ध्यान लागले. काही वेळाने भानावर येऊन त्यांनी शेजारी पाहिले आणि अखंडांनन्दांना म्हणाले, “माझ्या आयुष्यातल्या अतिशय महत्वाच्या क्षणांपैकी एका क्षणातून मी आता बाहेर पडलो आहे. या पिंपळाच्या झाडाखाली मला नेहमी पडत असलेल्या आजवरच्या आयुष्यातल्या एका प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. लहनात लहान अणू आणि प्रचंड विस्तार असलेलं ब्रम्हांड या दोहोत असलेल्या ऐक्याची प्रचिती मला आली आहे. या अफाट विश्वात जे जे आहे, तेच सारं आपल्या या छोट्याशा शरीरात सामावलेलं आहे. समग्र विश्वाचं दर्शन मला एका अणुमध्ये घडलं आहे.” त्यांना झालेल्या या साक्षात्काराच्या तंद्रीतच ते दिवसभर होते. आपल्या आयुष्यातला एक महान क्षण असे स्वामीजींनी या अनुभवाबद्दल म्हटले आहे. या झाडाला बोधिवृक्षाचं महत्व प्राप्त झालं होतं जणू. आज अल्मोर्‍याला पण रामकृष्ण मठ आहे.

आता अल्मोरा जवळच होतं. अल्मोरा उंच पर्वताच्या पठारावर वसलेलं होत. तिथे जाताना तीन,चार किलोमीटरचा चढ चढता चढता स्वामीजी थकले आणि भुकेने त्यांना चक्कर पण आली. अखंडानंद घाबरले, जवळपास काही मदत मिळेल का शोधू लागले. समोरच एक कबरस्तान होतं. बाजूला एक झोपडी होती. तिथे एक मुसलमान फकीर बसला होता. त्याने काकडीचा रस करून तो स्वामीजींच्या देण्यासाठी पुढे आला एव्हढ्यात त्याच्या लक्षात आलं, अरे हा तर एक हिंदू संन्यासी दिसतोय आणि तो थांबला. अशा अवस्थेत सुद्धा स्वामीजी त्याला म्हणाले, आपण दोघं एकमेकांचे भाई नाहीत काय? हे ऐकताच त्या फकिराने  स्वामीजींना रस पाजला. स्वामीजींना थोड्याच वेळात हुशारी वाटली आणि थोड्या विश्रांति नंतर ते तिथून निघाले. ज्या ठिकाणी स्वामीजींनी ही विश्रांति घेतली त्या ठिकाणी अल्मोर्‍याचे एक दाम्पत्य श्री व सौ बोशी सेन यांनी स्वामी विवेकानंद विश्राम स्थान उभं केलं आहे.

अल्मोर्‍याला लाला बद्री शाह यांच्याकडे राहिले. तिथून निघून गुहेमध्ये कठोर साधना आणि ध्यानधारणा केली. पुन्हा अल्मोर्‍याला परतले. अशातच कलकत्त्याहून तार आली की, त्यांच्या बावीस वर्षीय धाकट्या बहिणीने योगेंद्रबालाने आत्महत्या केली. स्वामीजी खूप अस्वस्थ झाले. लहानपणापासून बरोबर वाढलेल्या बहिणीचा अंत स्वामीजींना दु:ख देऊन गेला. तिचे लग्न लहान वयातच झाले होते तिला खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. तिचं घर खूप सनातनी होतं. धार्मिक पण सनातनी कुटुंब असेल तर स्त्रियांना केव्हढ्या हाल अपेष्टा आयुष्यभर सहन कराव्या लागतात. अशा स्त्रियांच्या नशिबी केव्हढं दु:ख येतं याची जाणीव स्वामीजींना यावेळी प्रखरतेने झाली. याचवेळी त्यांच्या मनात स्त्रीविषयक आधुनिक दृष्टीकोण तयार झाला. पण हे दु:ख त्यांनी जवळ जवळ दहा वर्षानी जाहीर बोलून दाखवले होते.

स्वामीजी, अलमोर्‍याहून निघून कौसानी, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग येथे गेले. रुद्रप्रयागचं सौंदर्य बघून ते प्रसन्न झाले. तिथला अलकनंदाचा खळाळत्या प्रवाहाचा नाद ऐकून ते म्हणतात, “ही अलकनंदा आता केदार रागाचे सूर आळवित चालली आहे.”

अखंडानंदांना अस्थम्याचा त्रास झाला. थोडे उपचार करून सर्व श्रीनगरला आले. तिथे कृपानंद, सारदानंद, तुरीयानंद हे गुरुबंधु पण एकत्र भेटले. इथे दीड महिना सर्वांनी ध्यानधारणा आणि उपनिषदांचा अभ्यास केला. नंतर टिहरीला महिनाभर राहून पुढे डेहराडूनला गेले. मग गणेशप्रयाग ,मसूरी, हरिद्वार करत देवभूमी हिमालयचा निरोप घेऊन स्वामीजी मिरतला येऊन पोहोचले.

 क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ श्रावण मनभावन ☆ सौ. अर्चना देशपांडे

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

?  विविधा ?

☆ श्रावण मनभावन… ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे☆

आषाढ अमावस्येला दिवे, समयाउजळून त्यांचे पूजन केले जाते .या दिवशी जरा जिवांतिकाचा कागद लावून श्रावण महिनाभर त्याचे पूजन केले जाते .दिवा हे ज्ञानाचे, वृद्धिंगतेचे प्रतिक मानले जाते. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे दीप. दिव्याची आवस म्हणजेच येणाऱ्या श्रावणाची चाहूल..दुसऱ्या दिवशी पासून श्रावण महिना सुरू होतो तसे पाहिले तर आषाढात पावसामुळे वातावरण कुंद असते ,बाहेर चिखलामुळे चिक-चिक असते.त्यामुळे घराबाहेर पडायला मन नाराज असते पण श्रावण येताच सगळीकडे अल्हाददायक वातावरण असते. या काळात निसर्ग बहरलेला असतो ,निसर्गाने मरगळ टाकून उत्साहाची हिरवळ पांघरलेली असते. अगदी दगडावरही शेवाळ उगवलेले असते पण या हिरव्या रंगांमध्ये विविधता आढळते .काही झाडांची पाने हिरवीगार तर काही झाडांची फिकट हिरवी तर काही पोपटी रंगाची आढळतात. तसे पाहिले तर हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे. या दिवसात ऊन- पावसाचा पाठशिवणीचा खेळ सुरू असतो .काही वेळा आकाशातील सप्तरंगी मोहक इंद्रधनुष्य पाहून डोळ्याचे पारणे फिटते.

बालकवी म्हणतात ,

“श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे

क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे”

तर कुसुमाग्रज म्हणतात “हसरा लाजरा आला श्रावण”

स्त्रीचे मन सांगते”सणासुदींची घेऊन उधळण

 आला हसरा श्रावण..,

कर्तव्य संस्कृतीची देतो आठवण

अनमोल संस्कृती ठेवा करू या जतन”

स्त्रीच्या नजरेतून पाहायचे झाल्यास  तिने सगळे बदल स्वीकारले आहेत अगदी हसत खेळत. तिने आपली संस्कृती जपली आहे. पूर्वी तिची जागा उंबऱ्याच्या आत होती पण येणारा प्रत्येक क्षण ती आनंदाने जगायची. यामध्ये सण , व्रत वैकले तिच्यासाठी पर्वणी असायची .श्रावण म्हणजे स्त्रियांचा आनंद वाढवणारा, त्यांचा मान सन्मान वाढवणारा महिना.या महिन्यात येणारे सण आनंदीत करतात.

श्रावणातल्या सोमवारी शंभू महादेवाचे पूजन केले जाते .पुण्याला तर मृत्युंजय महादेव मंदिरात पहाटेपासून महादेवाला दुधाचे अभिषेक सुरू असतात .बरेच भाविक पहाटे पहाटे स्नान करून दुधाची पिशवी घेऊन पायी मंदिरात पोहोचतात, दर्शन घेऊन प्रसादाचे दूध घेऊन घरी परततात आणि आपल्या कामावर जायला निघतात. संध्याकाळी तर अगदी जत्रेचे स्वरूप आलेले असते,दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात पण शिस्तीने दर्शन घेऊन भाविक समाधानाने घरी परततात.

आमच्या कॉलेज जीवनात श्रावणी सोमवारी हरिपूरला  जत्रेला जाण्यात एक वेगळाच आनंदा असायचा. स्टॅन्ड पासून गप्पा मारत, तिखट मीठ लावलेलया पेरूची चव चाखत हरिपूर केव्हा यायचे ते समजायचेच नाही. नेहमीच्या अभ्यासातून वेळ काढून एक छोटीशी पिकनिकच असायची.

मंगळवारी  मंगळागौर पूजन म्हणजे नवविवाहित तरुणींना  पर्वणी असायची ,तिचा निम्मा जीव सासरी तर निम्मा  जीवमाहेरी अशी  तिची अवस्था असायची. थोडक्यात एक पाय सासरच्या दारात तर दुसरा पाय माहेरच्या अंगणात. पूर्वी श्रावणात मुलीला माहेरी घेऊन जाण्यासाठी कोणीतरी येत असे.तिचे आसुसलेले मन म्हणायचं,

“सण श्रावणाचा आला आठवे माहेरचा झुला कधी येशील बंधुराया नको लावू वाट बघाया”

साधारणपणे 40 वर्षांपूर्वी नवविवाहित मैत्रिणीसह सकाळी मंगळागौरी पूजन केले जायचे , पांढऱ्या शुभ्र फुलांनी महादेवाची पिंड सजायची , आजूबाजूला गोकर्ण जास्वंद  गुलाब, बेल, पत्री, दुर्वा केवडयाचे पान लावून सुशोभित केली जायची.अशारीतीने मैत्रीणीच्या बरोबर मंगळागौर सजायची,,दुपारी मस्त पुरण  वरणाचे जेवण व संध्याकाळी सवाष्णी ना हळदी कुंकू, मटकीच्या उसळी सह फलाहार आणि रात्रभर फुगडी ,झिम्मा ,पिंगा…. सारखे  पारंपरिक खेळ खेळले जायचे.,या कार्यक्रमाला सखे,सोबती, नातेवाईक एकत्र येत त्यामुळे नात्याची वीण घट्ट होत असे.

श्रावण शुक्रवारी तर माहेरवाशीण सवाष्णीचे कौतुक न्यारेच असे. दुपारी पुरणाच्या दिव्यांनी औक्षण केले जायचे, जेवण्यासाठी काहीतरी गोड पक्वान्न आणि संध्याकाळी दूध व फुटाणे यांची मेजवानी असे. आम्ही लहान असताना आईबरोबर शुक्रवारी हळदी कुंकवाला  जात होतो तिथे अटीव दूध पिऊन येताना फुटाणे खाण्यात खूप मजा यायची. शिवाय घरी वेलदोडा, केशर घातलेले दूध असायचे. आजही या दुधाची चव जिभेवर रेंगाळते पण हल्ली नोकरी निमित्त स्त्री घराबाहेर पडू लागली पण त्यातूनही एखादी दिवस अर्धी रजा काढून मंगळागौर पुजते ,रविवारी शुक्रवारचीसवाष्ण , शनिवारचा मुंजावाढते,  सत्यनारायण पूजा करून घेते.लोकलच्या महिला डब्यामध्ये मंगळागौरीचे खेळ खेळते किंवा मंगळागौरीचा खेळ खेळणाऱ्या ग्रुपला बोलावून याचा आनंद लुटते .शुक्रवारी मैत्रिणींना फुटाणे देऊन हळदी कुंकवाची हौस भागवते.आजची स्त्री कितीही पुढारलेली असली तरी , तिची जीवनशैली आधुनिक असली तरी आपल्या सवडीनुसार आपले रीती रिवाज, परंपरा ती सांभाळत असते.

पूर्वी नागपंचमी राखी पोर्णिमा, गोकुळाष्टमी याशिवाय दररोज येणारा सण ती साजरे करायची त्यामुळे तिच्या शरीरावरचा ताण निघून जायचा,या सर्वातून ऊर्जा घेऊन पुढे येणाऱ्या गणपती गौरीच्या तयारीला ती लागत असे. 

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महिना अखेरचे पान – 7 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

महिना अखेरचे पान – 7 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

ज्येष्ठाच्या अखेरीस पावसाने हजेरी लावलेली असते. जणू काही ‘मी आलोय’ हे सांगण्यासाठीच सरी येऊन जातात. पण लवकरच हा पाऊस आपल्या लवाजम्यानिशी येतो तो मुक्काम करण्याच्या बेतानेच. सरी निघून गेलेल्या असतात आणि कोसळणारा पाऊस आषाढ घेऊन येतो. जून मध्ये निसर्गाची पाऊले नुसतीच ओली झालेली असतात. ती जुलैमधल्या चिखलात कधी बुडून जातात समजतही नाही.

आषाढ म्हटला की ओथंबलेल्या मेघमाला तर डोळ्यासमोर येतातच पण मनही कसं भरून आल्यासारखं वाटतं. पावसामुळं हवेत येणारा गारवा,कधी कुंद वातावरण,हातात वाफाळलेल्या चहाचा कप,जमिनीवर वाढत जाणारी हिरवाई,शेतात चाललेली लगबग,छत्री नाहीतर रेनकोटची रस्त्यावर वाढलेली वर्दळ, हे सगळं आषाढातच बघायला मिळणार.

पण आषाढ आला म्हटलं की पहिली आठवण होते ती कवी कुलगुरू कालिदासाची. आषाढाचा पहिला दिवस हा कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. खरं तर ही त्याची जयंती नव्हे किंवा पुण्यतिथीही नव्हे. पण त्याच्या अजरामर अशा ‘मेघदूत’ या महाकाव्याच्या स्मृती जागवून त्याच्या प्रतिभेला सलाम करण्याचा हा दिवस !

याच आषाढाचा म्हणजे सर्वांच्या परिचयाचयाच्या जुलै महिन्याचा पहिला दिवस कृषी दिन म्हणूनही साजरा होतो. तसेच हाच असतो डाॅक्टर्स डे आणि नॅशनल पोस्टल वर्कर्स डे. डाॅक्टरांबद्द्ल कृतज्ञता आणि पोस्ट कर्मचा-यांच्या कामाची दखल घेण्याचा हा दिवस. हा दिवस सी. ए. दिनही आहे.

सात जुलै हा चाॅकलेट डे असतो तर दहा जुलै आपण मातृ सुरक्षा दिन म्हणून साजरा करतो.

अकरा जुलै हा आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिवस म्हणून पाळला जातो.

भारताच्या दृष्टीने एकोणीस जुलै हा दिवस ही महत्त्वाचा आहे. कारण याच दिवशी 1969 साली प्रमुख खाजगी बॅंकांचे राष्ट्रीयिकरण करण्यात आले आणि लोकाभिमुख बॅकिंग ला सुरूवात झाली.

वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन व व्याघ्र दिन म्हणून जाहीर झाला आहे.

याच दिवशी 1969 साली मानवाने प्रथम पृथ्वीच्या बाहेर म्हणजे चंद्रावर पाऊल ठेवले. म्हणून वीस जुलै हा चांद्रदिनही आहे.

वन आणि पाऊस यांचे नाते लक्षात घेऊन तेवीस जुलै हा दिवस वनसंवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. तर चोवीस जुलै आहे कझिन्स डे. आपल्याच भावंडांना शुभेच्छा देण्याचा दिवस.

1999 साली कारगील येथे युद्धात  मिळवलेल्या विजयाची आठवण ताजी ठेवण्यासाठी सव्वीस जुलै हा कारगील विजय दिन म्हणून साजरा केला जातो. वाघांची घेती संख्या लक्षात घेऊन ,त्याविषयी जागृती करण्यासाठी एकोणतीस जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो.

 तीस जुलै हा आंतरराष्ट्रीय मैत्री दिन असतो.

भारतात जुलै महिन्याचा चौथा रविवार हा पालक दिन म्हणून साजरा केला जातो.

असे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिवस साजरे करत असतानाच आपण पारंपारिक सणवारही तेवढ्याच उत्साहाने साजरे करतो. ज्येष्ठात काही ठिकाणी कर्नाटकी बेंदूर झालेला असतो. आता या महिन्यात महाराष्ट्रीय बेंदूर येतो. तर मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सणही याच महिन्यात असतो.  

आषाढ महिन्यातील पौर्णिमा आणि अमावस्या या दोन्ही दिवसांना विशेष महत्त्व आहे. कारण पौर्णिमा ही गुरुजनांना वंदन करण्यासाठी व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘गुरूपौर्णिमा’ म्हणून साजरी होते. तर,अमावस्या ही ‘दिव्याची अमावस्या’ असल्यामुळे घरातील सर्व दिप,समया,यांचे पूजन करून त्या प्रज्वलीत केल्या जातात. प्रकाशाची पूजा करून अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणारा हा दिवस.

शुद्ध पक्षात येणारी एकादशी ही आषाढी एकादशी. ज्येष्ठात मार्गस्थ झालेल्या पालख्या पंढरपूरात येऊन पोहोचलेल्या असतात आणि अवघी पंढरी विठूरायाच्या नामाने दुमदुमून गेलेली असते.

याच महिन्यात थोर समाजसुधारक गो. ग. आगरकर आणि लोकमान्य टिळक  यांचा जन्मदिन आहे. तर बाजी प्रभू  देशपांडे,अण्णाभाऊ साठे,सरखेल कान्होजी आंग्रे,वीर शिवा काशीद, संत सावतामाळी आणि डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची पुण्यतिथि असते.  

एकीकडे निसर्गाच्या चक्राबरोबर पुढे पुढे जात आपण संस्कृती आणि परंपरा जपताना इतिहासातही डोकावून पाहत असतो. वर्तमानातील एक महिना संपतो आणि सर्वांचा मनभावन असा श्रावण खुणावू लागलेला असतो. मेघांनी भरपूर देऊन झालेल असतं. म्हणूनच की काय रिमझिमणा-या पावसासाठी मन आसुसलेलं असतं. ऊन पावसाचा खेळ बघायला डोळे आतूर झालेले असतात आणि हिरवाळीच्या वाटा श्रावणाकडे घेऊन जात असतात. 

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तुज पंख दिले देवाने… भाग -2 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆

डॉ मेधा फणसळकर

? विविधा ?

☆ तुज पंख दिले देवाने…भाग -2 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

याशिवाय अनेकदा घरातील  प्लबिंग, इलेक्ट्रिक कामे किंवा गॅस शेगडी दुरुस्त करणे यासारख्या छोट्या- मोठ्या कामांसाठी कोणी व्यक्ती उपलब्ध होत नाहीत. कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल दुरुस्ती हीही आजच्या काळातील आवश्यक असणारी गोष्ट आहेत. त्यातही कौशल्य असणारे लोक कमी आहेत. करियर म्हणून अशाही काही क्षेत्रांमध्ये कौशल्य प्राप्त करून एखादा विद्यार्थी आपली एक नवी वाट निर्माण करू शकतो. याशिवाय संगीत- नृत्य क्षेत्रात वापरली जाणारी वाद्ये तयार करणे- त्याची दुरुस्ती करणे, स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची दुरुस्ती, वॉशिंग मशीन दुरुस्ती अशाही कामांमध्ये कौशल्य असणाऱ्या व्यक्ती हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्याच आहेत. त्यामुळे या क्षेत्रातही करियरच्या अगणित संधी उपलब्ध होऊ शकतात. अशी कामे करणाऱ्या व्यक्तींना एकत्र करून एखादी एजन्सी तयार करणे व लोकांना घरपोच सेवा उपलब्ध करून देणे हाही एक व्यवसाय होऊ शकतो. दर महिन्याला मेंटेनन्स या स्वरूपात या सेवा उपलब्ध करून दिल्या तर लोक आनंदाने या सेवेचा लाभ घेतील.

“योजक: तत्र दुर्लभ:|” असे संस्कृतमध्ये एक वचन आहे. म्हणजे जगातील कोणतीही गोष्ट निरुपयोगी नसते. फक्त त्याचा योग्य वापर करणारा दुर्लभ असतो. आपले आयुष्यही इतके कवडीमोल नाही की ते सहज संपवून टाकावे. म्हणूनच ते सुंदर कसे करता येईल याचा विचार करण्याची गरज आहे. म्हणूनच दहावी/ बारावी हे केवळ आपल्या आयुष्यातील केवळ मैलाचा दगड आहेत एवढाच विचार विद्यार्थ्यांनी केला तर गुणांच्या चढाओढीत त्यांना नैराश्य येणार नाही.

आता लवकरच नवीन शैक्षणिक धोरण अमलात येणार आहे. कदाचित यावर्षीच्या बोर्डाची परीक्षा ही शेवटची बोर्डाची परीक्षा असेल. हे नवीन शैक्षणिक धोरण हे पूर्णपणे विद्यार्थीकेंद्रित आणि कौशल्याधारीत आहे. नवीन क्षितिजांचा, नवीन काळाला अनुसरून अनेक कौशल्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. शिवाय विविध विद्याशाखेमधील वेगवेगळे अडसर दूर करून एक पारदर्शक प्रणाली निर्माण करण्याचा यात प्रयत्न केला गेला आहे आणि मुळात पुस्तकी अभ्यासावर गुण न देता विद्यार्थ्यांच्या मूलभूत कौशल्यांचा अभ्यास करून गुण दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या मानसिक, भावनिक, सांस्कृतिक, सामाजिक , शारीरिक वाढीच्या दृष्टीने आवश्यक असणारे घटक या धोरणात समाविष्ट करण्यात आले आहेत. मुलांनी अधिकाधिक संशोधन, प्रयोगशीलता यावर भर देऊन परिस्थितीनुसार नवीन काहीतरी निर्मिती करावी. त्यासाठी  सर्व शाळांमधून अशाप्रकारची वातावरणनिर्मिती व्हावी अशी कल्पना या धोरणामध्ये आहे. त्यामुळे मुलांना येणारे नैराश्य आणि त्यातून नकळत केल्या जाणाऱ्या आत्महत्या यावर आपोआप नियंत्रण येईल अशी आपण आशा करु या.

परमेश्वराने सर्वच पक्ष्यांना उडण्यासाठी पंख दिले आहेत. पण कोणी किती भरारी मारावी हे त्या पंखांच्या क्षमतेवर अवलंबून असते. त्यामुळे घार जेवढ्या उंचावरून उडू शकेल तितक्या उंचावरून चिमणी उडू शकणार नाही. पण आपल्या मर्यादेत  आपल्याला आवश्यक तेवढी भरारी ती निश्चितच मारू शकेल. म्हणूनच आज निकाल जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना असे म्हणावेसे वाटते की-

 “ तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने”

तुमच्यातील क्षमता ओळखून, त्याचा पुरेपूर वापर करून भरारी मारायची ठरवली तर जीवन का नाही सुंदर बनणार?

© डॉ. मेधा फणसळकर

सिंधुदुर्ग.

मो 9423019961

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तुज पंख दिले देवाने… भाग -1 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆

डॉ मेधा फणसळकर

? विविधा ?

☆ तुज पंख दिले देवाने…भाग -1 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

हल्लीच मुंबईला एका लग्नाला गेले होते. त्यावेळी नीताला अचानक समोर बघून मला आश्चर्य वाटले. नीता म्हणजे माझी लहानपणीची शेजारची मैत्रीण! माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी असून नापास होत होत माझ्या वर्गात आली होती. 10 वीत दोनदा नापास झाल्यावर मात्र घरच्यांनी तिचे लग्न लावून दिले होते. तिच्या माहेरी गरिबी होतीच. पण सासरची परिस्थिती पण यथातथाच होती. लग्नानंतर माझा आणि नीताचा काही संबंध राहिला नव्हता. आणि आज अचानक या लग्नात ती मला लग्नाची केटरर म्हणून भेटली. तिच्याशी बोलताना कळले की लग्नानंतर मुंबईत आल्यावर आपल्या पुरणपोळ्या करण्याच्या कौशल्यावर तिने एक मोठा उद्योग सुरू केला. त्यात घरच्या सगळ्या लोकांना तिने सामावून घेतले आणि आज मोठी उद्योजिका म्हणून तिने मुंबईत नाव कमावले आहे. मला तिचे खूप कौतुक आणि अभिमान वाटला. आणि त्याचवेळी दहावी / बारावीचे निकाल जाहीर झाल्यावर आत्महत्या करणाऱ्या अनेक मुलांचे चेहरे डोळ्यासमोर तरळून गेले. नीताने त्यावेळी निराश होऊन असा काही निर्णय घेतला असता तर? पण तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होता आणि म्हणूनच आज ती ताठ मानेने उभी आहे.

हल्लीच दहावीचा निकाल लागला. काही दिवसांपूर्वी बारावीचा निकाल लागला. बऱ्याच जणांनी उत्तम यश संपादन केले आहे. आपापल्या आवडीच्या क्षेत्रात ते आपले करियरही करतील. पण आत्ताच्या ट्रेंडनुसार केवळ मेडिकल , इंजिनिअरिंग, सी. ए. किंवा एम्.पी.एस.सी/ यु.पी. एस. सी पास होऊन त्यात यश संपादन करणे म्हणजेच करियर का? ज्यांची ते करण्याएवढी बौद्धिक क्षमता नाही त्या मुलांचे काय? बऱ्याचदा परीक्षेतील गुणांना महत्व देऊन या मुलांच्या क्षमता तपासल्या जातात. पण एखाद्याकडे बौद्धिक क्षमता कमी असेल तर कदाचित दुसऱ्या प्रकारची क्षमता अधिक चांगली असेल. उदा. चित्रकला, सुतारकाम, नृत्य, गायन, शिलाईकाम, पाककला अशा इतर गोष्टीत ते अधिक पारंगत असतील आणि त्यांच्या या क्षमतेचा वापर करून त्यांना करियरमध्ये नवीन संधी निर्माण करता येऊ शकतात.

आपण लहानपणी खेळताना पत्त्यांचा बंगला करायचो. त्यातला सर्वात खालचा पत्ता काढला तर काय व्हायचे? सर्व बंगला कोसळून जायचा. वैद्यकीय, इंजिनिअरिंग, सी.ए. या सर्व क्षेत्रातही असेच आहे. या क्षेत्रातील फक्त वरची पदे आपण पाहतो. पण त्यांना मदत म्हणून लागणाऱ्या इतर गोष्टींचा आणि त्यात कौशल्य प्राप्त करून करियरच्या नवीन वाटा चोखाळण्याचा आपण कधी प्रयत्न करतो का? उदा. मेडिकलचेच उदाहरण घ्यायचे झाले तर रक्त- लघवी तपासणी, एक्स- रे, एम. आर. आय., डोळ्याचा नंबर तपासणे व चष्मा तयार करणे, दातांची कवळी तयार करणे इ. कामे प्रत्यक्षात डॉक्टर करत नाहीत. तर ती कामे करण्यासाठी वेगळे प्रशिक्षण घेऊन अनेक सहाय्यक त्यांना मदत करत असतात. इंजिनिअरिंग क्षेत्रातही  प्रत्यक्ष इंजिनियर होता आले नाही तरी इंजिनियरना सहाय्यक म्हणून कामे करण्यासाठी पण छोटे- मोठे कोर्स आहेत. अकौंटिंग क्षेत्रातही अनेक असेच कोर्स सध्या उपलब्ध आहेत. कॉम्पुटर क्षेत्रात तर लाखो संधी आहेत.

© डॉ. मेधा फणसळकर

सिंधुदुर्ग.

मो 9423019961

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆पानं…” ☆ प्रस्तुती – सुश्री सुप्रिया केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

🍃 “पानं…”  🍃 प्रस्तुती – सुश्री सुप्रिया केळकर ☆ 

काही पानं भरवायची असतात – (वही)

काही पानं वाढायची असतात – (जेवण)

काही पानं रंगवायची असतात – (खायची पानं)

काही पानं जाळायची असतात – (पालापाचोळा)

काही पानं जपायची असतात – (पिंपळ)

काही पानं कुटायची असतात – (पुदिना)

काही पानं लुटायची असतात – (आपटा)

काही पानं खुडायची असतात… (चहाची पानं)..

काही पानं तोरणात सजवायची असतात… (आंब्याची )

काही पानं केसात घालायची असतात… (केवड्याची )

काही पानं जोडायची असतात – (पुरवणी)

काही पानं लपवायची असतात – (प्रगती पुस्तक)

काही पान दुमडायची असतात, तर काही नवीन उघडायची असतात.  – (पानं सुख- दुःखाच्या क्षणांची)

संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ☆ सासू आणि दुधीभोपळ्याची भाजी ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? चं म त ग ! 😅

🤣 सासू आणि दुधीभोपळ्याची भाजी ! 😂 💃श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“काय गं हे सुनबाई ?”

“काय झालं आई ?”

“अगं आज चहाला काही चव नां ढव, नुसता पुचकावणी झाला आहे !”

“अहो रोजच्या सारखाच तर केलाय ! तुमच्या तोंडाची चव गेली असेल, म्हणून तसा लागतं असेल !”

“माझ्या तोंडाची चव जायला मी काय आजारी आहे ?”

“तसं नाही, पण या वयात जाते म्हणे कधी कधी जिभेची चव, त्यासाठी आजारीच पडायला हवं असंच काही नाही !”

“आता हे ज्ञानामृत तुला तुझ्या आईनं पाजलं वाटतं ?”

“हॊ !”

“मला वाटलंच !”

“म्हणजे ?”

“ते जाऊदे ! मला सांग, चहाची पावडर वगैरे बदलली आहे कां या महिन्याच्या वाण सामानात ?”

“अजिबात नाही आई ! पण असं कां वाटलं तुम्हांला ?”

“नाही, तुम्हीं हल्लीच्या मुली ! एखादा चहाचा नवीन ब्रँड आला आणि त्यावर एक काचेचा मग फुकट मिळतोय म्हटल्यावर, ती नवीन चहा पावडर घ्यायला तुम्ही मागे पुढे बघणार नाही, म्हणून म्हटलं !”

“नाही आई, चहा पावडर पण तीच आहे आणि दुध पण रोजचंच आहे !”

“तरी चव काही नेहमी सारखी नाही ती नाहीच !”

“आई द्या तो चहा माझ्याकडे, त्यात थोडी चहा पावडर आणि आल्याचा तुकडा टाकून उकळून आणते परत !”

“आता राहू दे सुनबाई ! तुला सांगते पूर्वी अख्ख्या मुंबईत कोपऱ्या कोपऱ्यावर इराणी हॉटेल असायची !तर त्यांच्या मुबंईतल्या कुठल्याही हॉटेलात जा, चहाची चव तीच, आता बोल !”

“म्हणजे आई, तुम्ही पूर्वी इराण्याकडे चहा प्यायला जायचात ?”

“काय तुझी अक्कल ! अगं मी कशाला जाते इराण्याकडे चहा प्यायला, अगं हे सांगायचे तसं !”

“बघा, म्हणजे तुमचा पण चहा कधीतरी बिघडायचा नां आई ?”

“कळलं कळलं, जास्त अक्कल नको पाजळूस !”

“बरं, आता तुम्ही चहा तसाच पीत असाल, तर मी लागू कां दुपारच्या स्वयपाकाला ?”

“लाग, पण जाण्याआधी मला सांग, मी केलेली कालची दुधी भोपळ्याची भाजी बाबूने खाल्ली नां ?”

“खाल्ली ? अहो आई, विलासने एकट्याने त्या दुधी भोपळ्याच्या भाजीचा पार फडशा पाडला ! मला आणि मुलांना उष्टवायला सुद्धा ठेवली नाही त्यानं ती !”

“मग ठीक आहे, जा आता तू, दुपारच्या स्वयपाकाचे काय ते बघ.”

“मी जाते, पण त्याच्या आधी मला एका प्रश्नाचं उत्तर द्याल का आई ?”

“विचार, खुशाल विचार तुझ्या मनांत काय प्रश्न आहे तो.”

“मला सांगा आई, मी जर दुधीभोपळ्याची भाजी केली तर….”

“माझा बाबू आणि मुलं त्याला तोंड सुद्धा लावत नाहीत आणि मी केली तर सगळेजण बोटं चाटून पुसून कशी खातात ? हेच विचारणार आहेस नां तू ?”

“हॊ, अगदी बरोबर!”

“अगं मी जेंव्हा दुधीभोपळ्याची भाजी करते नां, तेंव्हा त्यात एक खास पदार्थ आवर्जून घालते, म्हणून तर बाबू आणि त्याच्या बरोबर मुलं सुद्धा ती भाजी आवडीनं खातात हॊ !”

“कोणता पदार्थ आई ?”

“ते माझं सिक्रेट आहे सुनबाई !”

“पण मला सांगायला काय हरकत आहे आई ? अहो तुम्हीं गेल्यावर…..”

“अगं त्या दुधीभोपळ्याच्या भाजीच्या सिक्रेटसाठी माझ्या मरणावर टपलीस की काय ?”

“काही तरीच काय आई ? मी कशाला तुमच्या मारणावर टपू ?”

“अगं पण आत्ताच म्हणालीस नां, ‘तुम्हीं गेल्यावर’ म्हणून ?”

“बघा, तुम्हीच कसा अर्थाचा अनर्थ करता ते आई !”

“कसला अर्थाचा अनर्थ करत्ये मी ?”

“अहो तुम्ही गेल्यावर म्हणजे, तुम्हीं कधी गावाबीवाला गेलात आणि माझ्यावर दुधीभोपळ्याचीच भाजी करायची वेळ आली, तर तुमची रेसिपी माहित असावी, म्हणून विचारलं !”

“असं होय ! मला वाटलं….”

“आई, मी काही बोलले की तुम्हीं नेहमीच पराचा कावळा करता ! ते राहू दे, ते तुमचं भाजीच सिक्रेट आता तरी सांगाल का मला ?”

“अगं काही नाही गं सुनबाई, माझ्या बाबुला लहानपणापासून आपल्या कोपऱ्यावरच्या ‘लक्ष्मी फरसाण मार्ट’ मधली तिखट, मसालेदार कचोरी आवडते !”

“हॊ, ठाऊक आहे मला ते, विलास आणतो ती कचोरी अधून मधून. मुलं सुद्धा आवडीनं खातात ती कचोरी.”

“अगं तुला सांगते, ही जी दुधीभोपळ्याची भाजी आहे नां ती कितीही पौष्टिक असली, तरी त्याला नाक मुरडणारी लोकंच जास्त!”

“बरोबर.”

“माझा बाबू सुद्धा लहानपणी त्याला तोंड लावायचा नाही, पण नंतर नंतर त्याला ती आवडायला लागली बघ आणि आता तर काय एकट्याने सगळी भाजी फस्त करतो !”

“हॊ ते सगळं खरं आहे, पण अशी अचानक बाबुला आणि मुलांना तुमची दुधीभोपळ्याची भाजी आवडायचं कारण काय ?”

“कचोरी !”

“का sss य ? कचोरी ?”

“हॊ  sss य ! आपल्या ‘लक्ष्मी फरसाण मार्टची’ कचोरी !”

“आई, तुम्हीं जरा नीट एक्सप्लेन कराल का मला ?”

“अगं काही नाही, एकदा मी काय केलं बाबू त्या दुधीभोपळ्याच्या भाजीला तोंड लावत नाही म्हणून, त्यात एक दिवस चांगल्या तीन चार कचोऱ्या खलबत्त्यात कुटून घातल्या आणि तुमच्या भाषेत सांगायचं तर rest is history !”

“कमालच केलीत तुम्हीं आई !”

© प्रमोद वामन वर्तक

२९-०७-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares