मराठी साहित्य – विविधा ☆ देशाची समृद्धी भारतीय रेल्वे – भाग -2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ देशाची समृद्धी भारतीय रेल्वे – भाग -2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(चरैवेति  चरैवेति)

[नागपूर येथून प्रसिद्ध होणा-या ‘राष्ट्रसेविका’ या अंकासाठी  सौ.पुष्पा प्रभू देसाई यांच्या भारतीय रेल्वेवरील लेखाची निवड झाली आहे. तो आपल्या वाचनासाठी चार भागात देत आहोत.]

भारतीय रेल्वेच्या उत्पादन संस्था केंद्रीय मंत्रालयाच्या अखत्यारित येतात१) डिझेल  लोकोमोटिव  कार्यशाळा.,–वाराणसी., २)चित्तरंजन  लोकोमोटिव कार्यशाळा–चित्तरंजन. ३) डिझेल लोको  अधुनिक कार्यशाळा–पतियाळा. ४)इंटिग्रल कोच फँक्टरी–चेन्नई. ५)रेल कोच फँक्टरी कपूरथळा.  ६)रेल व्हील फँक्टरी बंगळुरू.  ७)रेल स्प्रिंग  कारखाना — ग्वाल्हेर.

रेल्वेची  प्रशिक्षण केंद्रेही  अनेक  ठिकाणी  आहेत. १) इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग– जमालपुर. २)रेल्वे स्टाफ कॉलेज –बडोदा। ३) इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिग्नल इंजीनियरिंग अंड हेवी कम्युनिकेशन — सिकंदराबाद.  ४)इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग –पुणे। ५)इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग –नासिक. सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टीम ही रेल्वे बोर्डाच्या नियंत्रणाखालील स्वतंत्र संस्था आहे. ती भारतीय रेल्वेसाठी संगणक प्रणालीचा विकास करते.

रेल्वे गाड्यांचे ही किती प्रकार सांगावेत१)उपनगरीय. २) एम.एम.यू. ३)डी. एम.यू.– डिझेल मल्टिपल युनिट. ४)डोंगरी. ५) पॅसेंजर  ६) एक्सप्रेस  ७)अतीजलद  ८) वातानुकूलित. ९) वातानुकुलीत सुपरफास्ट. १०) जनशताब्दी ११) शताब्दी. १२) संपर्क क्रांती. १३) गरीब रथ  १४) राजधानी. १५) दूरांतो. १६) दुमजली १७) अंत्योदय.  १८) उदय.  १९) तेजस .  २०) हमसफर . तसेच पॅलेस ऑन व्हील्स  ही विशेष गाडी राजस्थान सरकारने पर्यटन वाढवण्यासाठी सुरू केली भारत-पाकिस्तान दरम्यान समझोता एक्सप्रेस सुरू केली होती, पण आता की सुरू नाही. अपघाताच्या ठिकाणी लाईफ लाईन एक्सप्रेस काम करते. पुणे–नाशिक हाय स्पीड ला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे . मुंबई-दिल्ली मालगाडी साठी वेगळा मार्ग टाकणे चालू आहे. मुंबई– अहमदाबाद बुलेट ट्रेन चे काम चालू आहे. श्रीरामचंद्रांच्या स्थळांची तीर्थयात्रा करण्यासाठी, भारतीय रेल्वे “रामायण एक्सप्रेस ” सुरू करत आहे . सोळा रात्री आणि सोळा दिवस, प्रवास (१६०६५रु,.भाडे.).ए.सी.साठी (२६७७५ रु.). रेल्वेच्या वारसा यादीत अग्रणी असणाऱ्या आणि ९० वर्षे जुन्या असलेल्या, डेक्कन क्वीनचे मध्य रेल्वे आता रूप पालटणार आहे. जर्मन तंत्रज्ञान आधारित डबे, विशेष सुरक्षा व्यवस्था, आकर्षक बाह्यरूप, आरामदायी प्रवास, विशेष लोगो अशा सुधारणा आहेत.

भारतीय रेल्वेने प्रवाशांना गरजेप्रमाणे निरनिराळ्या वर्गांचे डबे केले आहेत.आरक्षित, द्वितीय, प्रथमवर्ग, खुर्चीयान, वातानुकूलित खुर्चीयांन, प्रथम आणि द्वितीय शयनयान, वगैरे. जोड मार्गिका वापरून, डबे एकमेकांना जोडले गेल्यामुळे, प्रवासी आतल्या आत एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाऊ शकतात.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ देशाची समृद्धी भारतीय रेल्वे – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ देशाची समृद्धी भारतीय रेल्वे – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(चरैवेति  चरैवेति)

[नागपूर येथून प्रसिद्ध होणा-या ‘राष्ट्रसेविका’ या अंकासाठी  सौ.पुष्पा प्रभू देसाई यांच्या भारतीय रेल्वेवरील लेखाची निवड झाली आहे. तो आपल्या वाचनासाठी चार भागात देत आहोत.]

भा–  र –त – ज्ञान आणि भक्ती मध्ये रमणारा, तो भारत. भारतीयांच्या चौकसबुद्धी मुळे भूमिती शास्त्र, ज्योतिषशास्त्र, गणित ,रसायन शास्त्र, वैद्यकशास्त्र, संगीत, साहित्य, कला अशा अनेक शास्त्रांनी, भारताला सौंदर्य आणि संपन्न बनविले.  अनेक गोष्टीत भारत समृद्ध होता. आणि आहे .त्यापैकीच आजच्या काळातील समृद्धी म्हणजे भारतीय रेल्वे.

भारतीय रेल्वेचे जाळे म्हणजे देशातील रक्ताभिसरण संस्था.’ लाईफ लाईन ‘असे म्हणायला हरकत नाही .त्याचा श्रीगणेशा झाला तो इंग्रजांच्या कारकीर्दीत. ती एक इंग्रजांनी दिलेली  देणगी आहे असे म्हणायला हरकत नाही. पहिला आराखडा तयार झाला, तो     १८32 मध्ये. पुढे’,’ रेड हिल’ नावाची पहिली रेल्वे  १८ 37 साली धावली . १८४४  मध्ये लॉर्ड हार्डिंग यांनी खाजगी व्यावसायिक मंडळींना रेल्वे चालू करण्याची परवानगी दिली . दोन रेल्वे कंपन्यांना  इस्ट इंडिया मदत करायला लागली.१८५१मधे सोलनी अँक्वाडक्ट रेल्वे ,रुरकी येथे बांधण्यात आली.१८५६मधे मद्रास रेल्वे कंपनीची स्थापना झाली आणि दक्षिण भारतात रेल्वेचा विकास सुरू झाला .१८५७ मधे पहिली प्रवासी गाडी बोरीबंदर ते ठाणे (३४कि. मि.) अशी धावली. त्याची चर्चा ब्रिटनच्या वर्तमानपत्रातही आली. साहिब, सिंध ,आणि सुलतान अशी त्या वाफेच्या इंजिनांची छान नावे ठेवून बारसे झाले. आता रेल्वेच्या बाळाने बाळसे धरायला सुरुवात केली. पुढे हावडा ते हुगळी (२४कि.मी.) नंतर १८६४ मधे  कलकत्ता ते अलाहाबाद–दिल्ली असा लोहमार्ग पूर्ण करून १८७०मधे गाडी त्यावरून धावायला सुरुवात झाली .१८७५ मधे ९१०० कि.मि.चे अंतर स्वातंत्र्यापर्यंत४९३२३ कि.मि. पर्यंत पोचले.१८८५ मधे भारतीय बनावटीचे  इंजीन  बनविण्यास सुरुवात झाली. आणि बाळस  धरलेलं बाळ आता चालायला लागलं. १९४७ पर्यंत भारतात ४२ रेल्वे कंपन्या होत्या. स्वातंत्र्यानंतर १९५१मधे त्या सर्व संस्थांचे राष्ट्रीयीकरण करून, ताठ मानेने भारतीय रेल्वे मानाने मिरवू लागली. स्वातंत्र्यानंतरही तिच्या विस्ताराचा वेग फारसा वाढला नाही. तरी विकास कमी झाला नाही. भारतीय रेल्वे देशाच्या प्रगतीशी जोडली गेली आहे.

पूर्वीच्या वेगवेगळ्या भागांचे एकत्रीकरण करून, त्याचे सहा भाग पाडले गेले .तरीही इतक्या मोठ्या  पसार्याचे  व्यवस्थापन करणे कठीण, म्हणून त्याचे आणखी सोळा-सतरा भाग पाडले गेले.

1) उत्तर रेल्वे–मुख्य ठिकाण दिल्ली.२)उत्तर पूर्व –गोरखपूर. ३)उत्तर पूर्व सीमा -गोहाटी. ४) पूर्व रेल्वे- कलकत्ता. ५)दक्षिण पूर्व-कलकत्ता.६) दक्षिण मध्य-सिकंदराबाद.७) दक्षिण रेल्वे–चेन्नई.८) मध्य रेल्वे–पुणे.९)  दक्षिण पश्चिम–हुबळी.१०)उत्तर पश्चिम–जोधपूर.११) पश्चिम मध्य–जबलपूर.१२) उत्तर मध्य–अलाहाबाद.१३) दक्षिण पूर्व मध्य–बिलासपूर.१४) पूर्व तटीय–भुवनेश्वर.१५)  पूर्व मध्य–हाजिपूर.१६) कोकण रेल्वे–बेलापूर. कोकण रेल्वे भारतीय रेल्वे बोर्डाच्या नियंत्रणाखाली वेगळी संस्था आहे. सोयीसाठी प्रत्येक रेल्वे विभागाने पुन्हा ६४ भाग पाडले आहेत. उपनगरीय प्रवासी वाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे प्रणाली वापरली जाते. मुंबई, कलकत्ता, चेन्नई, हैदराबाद ,पुणे येथे ती कार्यरत आहे. मुंबई, कलकत्त्याच्या उपनगरीय वाहतूकीच्या गाड्या स्वतंत्र उड्डाण पुलासारख्या मार्गावरून धावतात. मुंबई हे ठिकाण पश्चिम मध्य आणि हार्बर वर येत असल्याने मुंबईकर उपनगरीय सेवेवर अवलंबून असतात. तिच्यावर त्यांचा खूप जीव आहे. त्यामुळे ही सेवा मुंबईची नस मानली जाते.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वाचन आणि अभिवाचन ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

? विविधा ??‍?

☆ विविधा ☆ वाचन आणि अभिवादन… ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆ 

वाचन हा शब्द वाचनाची रुची असणार्यासाठी आनंददायी, उत्साहवर्धक आणि मनापासून आवडता असा आहे . मात्र काही जणांसाठी दुपारच्या वेळी वर्तमानपत्र ‘ किंवा पुस्तक डोळ्यासमोर धरले की निद्रा प्रसन्न होते असा अनुभव ! त्यांना लाभणारा आनंद आगळा वेगळा ! पण वाचाल तर वाचाल हेच त्रिवार सत्य आहे .

अर्थात वाचाल तर वाचाल हे एखाद्या रिक्षाच्या – ट्रकच्या मागील बाजूला लिहिले असते, ते न वाचण्यासाठी – किंवा न वाचणाऱ्यांसाठी ! कारण मागून येणारा गाडीवाला हे वाचेल की आपली गाडी चालवण्याकडे लक्ष देईल ?

काही का असेना,वाचन हे प्रत्येकासाठी अतिशय आवश्यक,उपयुक्त,विचारांना प्रगल्भता आणणारे आणि मन प्रसन्न करणारे असतेच असते. ज्याला वाचनाची आवड असते,त्याला कधीही कुठेही कंटाळा येत नाही,तो आपला आपला वेळ झकास घालवू शकतो आणि कायम ताजातवाना राहू शकतो .

वाचनाचे प्रकारही खूप आहेत बरं!रस्त्यावरून जाताना दुकानाच्या पाट्यांचे वाचनही मनाला रिझ वते .शाळेमध्ये नुकताच इंग्रजी शिकायला सुरुवात केलेला एक मुलगा,एसटी स्टॅण्ड जवळील पाट्या वाचून बुचकळ्यात पडला. त्याला समजेना या भागामध्ये लोडगे आडनावाचे इतके लोक कसे?तो पाट्या वाचताना Ram Lodge,श्रीकृष्ण लोडगे, शिवाजी  लोडगेअसे वारंवार लोडगे लोडगे येत होते .पुढच्या इयत्तेत गेल्यानंतर त्या स्पेलिंग चा उच्चार आणि अर्थ त्याला समजला आणि त्याला आपल्या बाल वाचनाचे हसू आले .

वाचन होण्यासाठी प्रामुख्याने आपले डोळे चांगले हवेत .तरच आपण वाचू शकतो .लहान वयात एकदा का वाचनाची गोडी लागली की त्या व्यक्तीला तहान भूकही लागत नाही .आणि नुसतेच खायला मिळाले,वाचायला नाही मिळाले तरी त्याला रोजचे जगणे नीरस वाटायला लागते.. गोडी निघून जाते. वाचनाचे कितीतरी फायदे आहेत. व्यक्तिमत्त्व विकासासाठी त्याच्यासारखे दुसरे साधन नाही. वाचन करणारा चांगले वाचतोच पण त्याच बरोबर दुसऱ्याचे बोलणे ऐकतो सुद्धा .आपलेच घोडे जाऊदे पुढे !असे करत नाही .

मुख्यतः वाचन हे स्वतःसाठी होते .अभिवाचन ही त्यापुढची महत्त्वाची पायरी आहे .अभिवाचन यामध्ये वाचन आहेच आहे,पण हे वाचन स्वतःबरोबर दुसर्‍यांसाठीच आहे. ऐकणाऱ्या चे कान तृप्त करण्याची, मन उल्हसित करण्याची, माहिती समजून देण्याची जबरदस्त ताकद अभी वाचनामध्ये असते. सहसा आपणअभिवाचन”आकाशवाणी” वरून ऐकतो. अभिवाचना मध्ये फक्त वाचकांचे डोळे काम करत असतात आणि असंख्य श्रोत्यांचे कान आणि मन काम करत असतात.श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची ताकद, अभी वाचकाच्या वाचनामध्ये,आवाजामध्ये,उच्चार यांमध्ये असते.ही एक दोन बाजूंनी होणारी प्रक्रिया  असते .अभी वाचकाला वाचनाची आवड तर पाहिजेच पण ते वाचन बिनचूक हवे -एकही शब्द जराही चुकून चालत नाही .चुकलाच तर श्रोत्यां पेक्षा त्या वाचकालाच जास्त अपराधी वाटते .विशेषतः अंधांना,निरक्षरांना. आणि गृहिणींना या अभिवाचनाचा जास्त फायदा होतो. त्यांना बसल्या जागी, सहज नवीन माहिती, साहित्य कानावर पडते. अन त्यांच्या मनावर कोरले जाते. म्हणून आवड असणाऱ्याने वाचनाबरोबर अभी वाचनाची सवय लावून घेतली. तर त्याच्या कडून एक प्रकारे समाज सेवा घडू शकते.

वाचन हे फक्त शब्दांचे होऊ शकते असे नाही तर चित्रांवरून ही आपण वाचन करू शकतो .विशेषतः लहान मुलांना चित्र वाचनाचा फार फायदा होतो .नवीन नवीन वस्तूंचा परिचय होतो,माहिती होते आणि आपोआप ज्ञानामध्ये भर पडते.

चला तर पुन्हा एकदा लहानांपासून मोठ्यांपर्यंत वाचन आणि अभि वाचनाचे ओळख करून देऊ या आणि आपण हे दोन्ही प्रकारे वाचू या .आयुष्यातला आनंद वेचु या .

अर्थात हे विचार सुद्धा जो कोणी वाचेल त्यालाच पटेल.

© सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रतिबिंब ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे

सौ.मंजुषा सुधीर आफळे

?  विविधा ?

☆ प्रतिबिंब ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे ☆ 

पावसाचे दिवस होते. काहीतरी१७/९/२०२१ बाजारातून आणायचे, म्हणून मी घराबाहेर पडले.त्यातच, थोडे अंतर गेल्यावर पावसाने मला गाठलेच. पाऊस कोसळू लागला. मी पण आडोशाला थोडा विसावा घेत उभी राहिले. विसाव्याच्या क्षणी मन एकांत न शोधेल तर नवलच. “मन वेड असतं” असे म्हणतात, ते पण खरं. विसाव्याच्या क्षणी, मनाच्या गाभाऱ्यात लपलेल्या प्रतिबिंबांना निरखून पाहण्याची एक सवय आपल्याला असतेच. मी पण या क्षणी वेगवेगळी प्रतिबिंब पाहण्यात दंग झाले.

मी जिथे उभी होते, तिथून काही अंतरावर असलेल्या जागेकडे माझी नजर पुन्हा पुन्हा वळत होती. कारण, मला रोज बकुळा येथेच भेटत होती. अगदी याच वेळी. आजही तिच्या आठवणींनी मन बेचैन झाले. बकुळा आता दूर गावी गेली होती. आमच्या राहत्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या, एका बिल्डिंग मध्ये ती राहत होती. ती जवळच्याच एका गतिमंद मुलांच्या शाळेत जात असे. आमच्या घराच्या समोरील रस्त्यावरूनच ती येत जात असे. मीही कधी कधी मोकळा वेळ मिळेल, तेव्हा त्याच शाळेत मुलांना भेटायला जात असे. संध्याकाळी फिरायला गेल्यावर, किंवा मंदिरात बकुळा मला भेटत असे. ती दिसायला खूपच छान होती. उंची तशी कमीच, आवाज मात्र मोठा. जीभ थोडी जड असल्याने कधी कधी तिचे बोलणे कळत नसे. स्वच्छ पण थोडे अघळपघळ कपडे ती घालत असे. केस  छोटे. पण डोळे मात्र खूपच बोलके. रस्त्यात गर्दीच्या ठिकाणी,  ती मला नेमकेपणे ओळखत असे. माझा हात आपल्या हातात पकडून, “ताई, उद्या येणार ना शाळेत?” असे विचारत असे. मग मी, “हो, तू पण ये हा” असे म्हणल्या शिवाय तिचे समाधान होत नव्हते. तिचा तो प्रेमळ स्पर्श आमचे आदल्या जन्मीचे ऋणानुबंध असल्याचे सांगुन जाई. तिच्या इतके प्रेमळ निरागस व भाबडे हास्य, मी याआधी आणखी कुणाचेही पाहिले नाही. काही क्षणांतच, ती आपला हात घाईघाईने सोडवून घेत असे. व हसत हसत झपाझप पुढे निघून जाई. एवढीच काय ती भेट. पण या भेटीची ही मनाला सवय लागली होती. आज तिच्या आठवणीने मनात प्रश्न उमटत राहिले. खरेच, कशी असेल ती? नवीन जागेत तिला समरस होता आले असेल का? आपली आठवण तर येतच असेल. आणि मी मनातल्या मनात प्रार्थना करू लागले.” देवा, तिला आवडणारी एखादी ताई तिला लवकर भेटू दे. ती नेहमी आनंदी, सुरक्षित, व सुखी राहू दे. आता पाऊस थांबला. मी पण एकांतातून  बाहेर आले. काम आटपून घरी आले. आणि दारातच असणाऱ्या नारळीच्या झाडाकडे माझे लक्ष गेले. त्या नारळीच्या झाडात, एक छोटे सुपारी चे झाड आपोआप आले होते. ते झाड पाहून आम्ही सर्वजण आनंदित झालो. त्याची नीट काळजी घेऊ लागलो. पण तरी हळूहळू लक्षात येऊ लागले की, झाडाची वाढ खुरटली आहे. पाणी भरपूर असले तरी, सूर्यप्रकाशा साठी सुपारीला संघर्ष करावा लागत होता. नारळीच्या झावळ्यांचा, मोठा पसारा तिच्या डोक्यावर होता. नाजूक असूनही हे झाड, नारळी च्या कुशीत धिटाईने उभे होते. नुकत्याच, छोट्या छोट्या हिरव्या झावळ्या फुटल्या होत्या. तरीपण रोज पाणी घालताना काळजी वाटत होती. अगदी बकुळी सारखीच. कसे होईल या सुपारीचे? बाकी झाडांचे काय? आणि माणसांचे काय? सुख दुःख सारखेच की, दोन्हीही सजीव आहेत. आपला जिवंतपणा टिकवून चैतन्य देत राहतात. त्यांच्या सहवासात येणाऱ्यांना नवीन ऊर्जा देत राहतात. पण एकदा का त्यांची वाढ खुंटली. तर मात्र त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. त्यांच्या वेगळ्या अस्तित्वाची जाणीव होऊ लागते. आणि मन जरा हळवे होतेच. पण त्यांच्यातील एकाकीपणा न्यूनता कमी करण्याच्या प्रयत्नात, आपल्याला हातभार लावता आला, तर तो आनंद फुलवताना खूप समाधान मिळते. व अशा वेळी आपल्याला होणारे कष्ट, खूपच क्षुल्लक वाटतात. म्हणूनच असे अनमोल क्षण अनुभवायचे, व मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवायचे. आठवणींची ही “मोरपिसे” मनाच्या आरशात प्रतिबिंब होऊन राहतात. आणि आपल्याला बरंच काही   देऊन जातात. आपले मन प्रफुल्लित करणारी असतात. गरज असते, कधीतरी अंतर्मुख होऊन अशी प्रतिबिंब न्याहाळण्याची.  म्हणूनच विसाव्याच्या क्षणी जेव्हा जेव्हा तुम्हाला या आरशात डोकावण्याची संधी मिळेल, तेव्हा ती सोडू नका. या मोरपिशी आठवणी, अनमोल आहेत. आयुष्यात रंगीबेरंगी ऊर्जा, चैतन्य निर्माण करणाऱ्या आहेत. या आपल्याला माणूस म्हणून जगायला शिकवतात.

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

१७/९/२०२१

विश्रामबाग, सांगली.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! – पोपट ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? पोपट ! ??

सूर्य मावळतीकडे कलला होता. आता अंधार पडायला सुरवात झाली होती.

सगळीकडे शांतता… आजूबाजूला कोणतेही आवाज ऐकू येत नव्हते. वाटेवर पावसाचं पाणी साचल्यामुळे चालताना पायाचा ‘पचक पचक’ असा आवाज तेवढा येत होता….

गण्याला आज घरी जायला जास्तच उशीर झाला होता, त्यात हा पाऊस. पण रस्ता पायखलाचा होता म्हणून ठीक, पण या पावसामुळे आधीच गावच्या रस्त्याला असलेले मिणमिणते दिवे गुल झाले होते. अजून घर येण्यासाठी त्याला भरपूर रस्ता कापायचा होता. आता चांगलाच अंधार पडला होता आणि अमावस्या असल्यामुळे तो जास्तच गडद आणि भीतीदायक वाटत होता. त्यातल्या त्यात त्या अंधारात त्याला हातातल्या मोबाईल मधल्या विजेरीचा काय तो आधार वाटत होता !

तसा गण्या धीट गडी, पण या अमावस्येच्या किर्र रात्री त्याला नको नको ते आवाज येत असल्याचे भास व्हायला लागले. रस्त्यातले ते नेहमीचे पिंपळाच्या पाराचे वळण आले. गण्या मनांत खरंच घाबरला आणि मोठ मोठ्या आवाजात रामरक्षा म्हणू लागला. त्यात बहुतेक मोबाईलची बॅटरी डाउन झाल्यामुळे मोबाईलची विजेरी पण फडफडायला लागली आणि पाराचे वळण येण्या आधीच तिने अखेरचा श्वास घेतला व गण्याच्या डोळयांपुढे काळोख पसरला. तेवढ्यात पारा खालून त्याला कोणीतरी हसल्याचा आवाज आला. तो आवाज ऐकताच मागे वळून न बघता गण्या घराकडे तिरासारखा धावत सुटला. तो थोडा धावला असेल नसेल तोच पुन्हा एकदा त्या हसण्याचा आवाज त्याच्या कानी पडला, त्या बरोबर गण्या अंगातली होती नव्हती ती शक्ती एकवटून पुन्हा घराच्या दिशेने जोरात धावत सुटला. थोडं पुढे आल्यावर गण्या धीर एकवटून रस्त्यात थांबला व त्या आवाजाचा कानोसा घ्यायचा त्याने पुन्हा प्रयत्न केला. पण आता तो आवाज काही त्याच्या कानी पडला नाही. आता घर पण टप्प्यात आलं होतं त्यामुळे त्याच्या जीवात जीव आला.

घरी आल्या आल्या काहीच न बोलता हात पाय धुवून तो जेवायला बसला. जेवताना पण गप्प गप्प ! शेवटी बायकोने न राहून विचारलंच “आज जेवणात काही कमी जास्त झालंय का?” “नाही” “मग आज एकदम गप्प गप्प, कुणाशी भांडण वगैरे?” बायकोला त्या आवाजबद्दल सांगावे का नाही या विचारात त्याच्या तोंडून “काही नाही गं, थोडी कणकण वाटत्ये, म्हणून…” “अगं बाई, मग असं करा जेवण करून, मी काढा करते तो प्या आणि झोपा बघू, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल.” “बरं” इतकंच म्हणून गण्यान जेवण आटोपत घेतलं आणि तो पलंगावर आडवा झाला. पण निद्रादेवी काही प्रसन्न व्हायचं लक्षण दिसेना. त्यात पुन्हा त्याच्या कानात तो मगाचा हसण्याचा आवाज येत राहिला. कोण हसत असेल? त्या पारावर भूत खेत असल्याच्या वावड्या त्याने लहानपणा पासून ऐकल्या होत्या. त्यात आजची अमावस्येची रात्र, विचार कर करून त्याच्या डोक्याचा भुगा झाला.  तेवढ्यात बायको काढा घेऊन आली. गाण्याने निमूटपणे काढा घेतला आणि डोक्यावर परत पांघरूण घेऊन निद्रादेवीची आराधना करू लागला. पण तो हसण्याचा आवाज काही त्याची पाठ सोडत नव्हता. विचार कर करून शेवटी त्याचा मेंदू थकला आणि पहाटे पहाटे कधीतरी त्याचा डोळा लागला.

सकाळी गण्या नेहमी प्रमाणे आवरून शाळेला निघाला. आज पावसाचा मागमूस नव्हता, लख्ख ऊन पडले होते. पण कालचा हसण्याचा आवाज काही त्याच्या मनातून जात नव्हता. रस्त्यातला नेहमीचा पिंपळाचा पार आला आणि आज शाळेचा रस्ता बदलावा का, या विचारात असतांनाच त्याचे लक्ष पाराकडे गेले. पारा जवळ म्हादू काहीतरी शोधत असल्याचे त्याला दिसले. गण्याने पुढे होतं “म्हादबा सकाळी सकाळी काय शोधताय पारा जवळ?” “नमस्कार मास्तर. काल पासून मोबाईल हरवला आहे माझा.” “अहो मग घरी शोधा ना, इथे पाराजवळ कशाला….” “मास्तर, काल रात्री घरी मुलाच्या मोबाईल वरून कॉल करून बघितला, बेल वाजत्ये पण घरात कुठेच नाही मिळाला.” “पण मग तो पारा जवळ शोधायच कारण काय?” “मास्तर, आता वय झालं, काल आम्ही मित्र मंडळी इथंच पारावर गप्पा मारत होतो, तेवढ्यात पाऊस यायला लागला. माझ्याकडे छत्री नव्हती” “मग?” “मग मी माझा मोबाईल इथेच कुठे तरी ठेवला, पण तो नक्की कुठे ठेवला हे आठवत नाही बघा.” “अस्स ! मी काही मदत करू का तुम्हाला मोबाईल शोधायला?” “मास्तर तुमच्याकडे मोबाईल आहे ना?” “हो आहे ना” असं म्हणून गण्याने खिशात हात घालून आपला मोबाईल काढला. “हां, मास्तर आता एक काम करा.” “बोला म्हादबा.” “तुमच्या मोबाईल वरून मला फोन लावा बघू.” गण्याने म्हादबाने सांगितलेल्या नंबर वर फोन लावला आणि पिंपळाच्या झाडाच्या ढोलीतून कुणीतरी कालच्या सारखं हसल्याचा आवाज गण्याला आला ! त्या बरोबर “मिळाला, मिळाला” असं आनंदाने ओरडत म्हादबा त्या ढोली जवळ गेला आणि त्याने आतून आपला मोबाईल काढून गण्याला दाखवला, जो अजून जोर जोरात काल रात्री सारखं हसतच होता ! आणि ते हसणं ऐकून गण्या पण कधी हसायला लागला ते त्याच त्यालाच कळलं नाही !

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पंडित जितेंद्र अभिषेकी  -शास्त्रीय संगीतकार व गायक ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

?  विविधा ?

☆ पंडित जितेंद्र अभिषेकी  -शास्त्रीय संगीतकार व गायक ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे 

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर….., चंद्र व्हा हो पांडुरंग अशा छान छान गाण्यांना संगीतबुद्ध करणारे व स्वतः गाणारे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतकार व गायक जितेंद्र अभिषेकी यांचा जन्म 21 सप्टेंबर 1932 सालीझाला.

गोव्याच्या मंगेशीच्या देवळात शंकराच्या पिंडीवर अभिषेक करणाऱ्या नवाथे यांच्या अभिषेकी घराण्यात त्यांचा जन्म झाला. कीर्तनकार असलेल्या वडिलांकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढे त्यांनी पंडित जगन्नाथ पुरोहित यांच्याकडे संगीताचे रितसर धडे घ्यायला सुरुवात केली. संगीताच्या शिक्षणासाठी त्यांनी गोवा सोडले आणि ते पुण्याला आले. पुण्यात अनाथाश्रमात राहून, वारावर जेवून, माधुकरी मागून ते शिकले. त्यांनी एकूण 21 गुरु केले व प्रत्येक गुरूकडून जेवढे पाहिजे तेवढेच घेतले. ते सारे संस्कार आत्मसात करून आपली स्वतंत्र गायन शैली त्यांनी निर्माण केली. प्रयोगशीलता हा त्यांच्या संगीत दिग्दर्शनातील महत्त्वाचा गुणधर्म. त्यांनी संगीत दिग्दर्शनात केलेले प्रयोग लोकांना खूप आवडले.. उदाहरण द्यायचे झाले तर मैलाचा दगड ठरलेल्या “कट्यार काळजात घुसली “या नाटकाची सुरुवात त्यांनी भैरवीने केली होती तर 1966 साली रंगभूमीवर आलेल्या” लेकुरे उदंड झाली”या नाटकात मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या “किरी स्तावांच्या  तियात्र “नाट्य प्रकारातल्या संगीताचा त्यांनी वापरला या नाटकात सगळ्यात पहिल्यांदा रेकॉर्डेड साऊंड ट्रॅक्स वापरले गेले. हे संगीत काळाच्या पुढे जाणारे होते. अभिषेकींनी स्वतःसंगीत दिलं तसं दुसऱ्यांच्या संगीत दिग्दर्शनातही ते गायले. आकाशवाणीसाठी केलेल्या ” बिल्हण “या संगीतिकेत पु.ल. च्या संगीत दिग्दर्शनात ते गायले. यातली गीते मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली होती तर” वैशाखवणवा” या चित्रपटासाठी दत्ता डावजेकर यांनी संगीत बद्ध केलेले “गोमू माहेरला जाते होनाखवा” हेगीत ही त्यांनी म्हटले. अनेक नाटकांना संगीत दिले.

एक चतुरस्त्र गायक, संगीतकार व संगीतज्ञ म्हणून प्रसिद्धी मिळवली. ते गोवा कला अकादमीचे सल्लागार व संस्कारभारतीचे सदस्य होते. त्यांनी चिपळूण येथील ७६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.

त्यांची गाजलेली गानसंपदा….. अनंता तुला कोण पाहु…कबीर गुलाल उधळीत रंग..अभिरामा सुगंधाचा… अमृताची फळे… आम्हा न कळे ज्ञान… काटा रुते कुणाला.. कैवल्याच्या चांदण्याला….. गोमू माहेरला जाते हो.. तपत्या झळा उन्हाच्या..  दिवे लागले रे दिवे.. ध्यान करू जाता मन… प्परब्रम्ह भेटी लागी… पांडुरंग दाता.. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल…. शब्दावाचुन कळले सारे.. सर्वात्मका सर्वेश्वरा… हरी भजना वीण  काळ… हे बंध रेशमाचे.. हे सुरांनो चंद्र व्हा..  हे दीपा तू जळत राहा… विकल मन माझे झुरत.. स्वप्नात पाहिले जेते राहूदे… चंद्रा लेणी तुझी रोहिणी.. जा उडुनी जा पाखरा… इत्यादी.

आपल्या संगीतातील कार्याने अजरामर झालेल्या पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी7 नोव्हेंबर 1998 रोजी जगाचा निरोप घेतला.अशा या थोर गायकाला विनम्र प्रणाम!

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सत्यनारायण पूजा : काळाची गरज – भाग 2 ☆ श्री अभय शरद देवरे

? विविधा ?

☆ सत्यनारायण पूजा : काळाची गरज – भाग 2 ☆  श्री अभय शरद देवरे ☆ 

पुढे चालू

देवाला नैवेद्य दाखवणे हा पूर्ण भक्तीयोग आहे. त्यातील विज्ञान योग कोणता ते पाहू.

गणपतीचा नैवेद्य ठरलेला. मोदक.

मोदकच का ?

गणेशांना आवडतो म्हणून !

का आवडतो ?

गणेश हा बुद्धीदाता आहे. आणि मोदकातील पुरण म्हणजे गुळ खोबरे आणि वर तूप हे काॅम्बिनेशन म्हणजे साक्षात बुद्धिवर्धक योग आहे. बूस्ट बोर्नव्हीटा, माल्टोव्हा, काॅम्प्लान इ. म्हणजे फक्त टीनचे डब्बे. बाकी त्यात सोयाबीनची टरफले, नारळाची भुशी आणि शेंगदाण्याचा चोथाच असतो. जर्रा जाहीरात दाखवायची खोटी, पडले तुटून त्या डब्यावर. हे जाहिरात तंत्र या कंपन्यांना बरोब्बर माहिती आहे, त्यामुळे जाहिरातींचा मारा करून, सचीन, कपील इ. ब्रॅण्डचा वापर केला की, आपले प्राॅडक्ट खपते. चोथा खाऊनच जर वजन वाढणार असेल तर मग असली नारळ आणि शेंगदाणेच का नकोत ? नारळ आणि शेंगदाणे खाऊन तब्येत सुधारत होती. घरच्या घरी बारा बारा बाळंतपणे होत होती. टाॅनिक म्हणून काय होते ? गुळ आणि शेंगदाणे. नारळ आणि गुळ. जो आपल्याकडे नैवेद्य म्हणून दाखवला जात होता आणि आमच्याच घरातील बाल हनुमान आणि बाल गणेशांना प्रसाद म्हणून मिळत होता. भक्तीपूर्ण नैवेद्याला, कोलेस्टेरॉलच्या भीतीने बदनाम केले गेले आणि जाणीवपूर्वक आरोग्याचा व्यापार सुरू झाला.

देवीला पुरणाचाच नैवेद्य लागतो.

पुरण म्हणजे चणे. हरभरे डाळ शिजवून गुळ घालून केलेले मनगणे असो वा कडबू असोत, पुरणाची पोळी असो वा नुसते पुरण असो, आणि या सर्व नाजूक नैवेद्यावर साजूक तूपाची धार…… फक्त ताकद वाढत होती. वेगळ्या टाॅनिकची गरज नव्हती. घोड्याला काय खाद्य दिले जाते ? हरभरेच ना ? घोड्यासारखी गती आणि वाजीकर शक्ती मिळवण्यासाठी तसेच तेच खाद्य आपल्याला मिळण्याची व्यवस्था आपल्या देवांच्या नैवेद्यामधून केलेली होती. गॅस वाढतो, पित्त वाढते, जाडी वाढते म्हणून जेवणातून चणाडाळच हद्दपार केली आणि प्रोटीन पावडरचे डब्बे मात्र जिममधे खपवले जाऊ लागले. हे कधी लक्षातच आले नाही.

नागपंचमीला नागोबाला लाह्या, हळदीच्या पानात लपेटलेल्या पातोळ्या, पानगे, गोकुळाष्टमीला शेवग्याच्या पाल्याची भाजी, कोजागिरीला आटीव दूध, गुढीला श्रीखंड, हे नैवेद्य आरोग्य रक्षण करणारेच होते. नारळीपौर्णिमेला नारळीभात ठरलेलाच. नारळावरूनच ओळखली जाणारी ही पौर्णिमा!

वेगवेगळ्या ऋतुमधे येणारे वेगवेगळे सण, आणि या निमित्ताने होणारे नैवेद्य हे जणु काही आरोग्याचे बूस्टर डोसच होते. दरवर्षी नियमाने घ्यायचे आणि आरोग्य सांभाळायचे !

या लेखाच्या अनामिक लेखकाचे आभार मानावे तेवढे थोडेच !

मलाही जाणवले की इतरवेळी नाश्त्याला शिरा असतो तोच पूजेच्यावेळी प्रसाद बनतो. कसे माहीत नाही पण तेच पदार्थ वापरून तीच गृहलक्ष्मी जेंव्हा शिरा हा प्रसाद म्हणून बनवते तेंव्हा त्याची चव वेगळी लागते. कारण त्यात भक्ती उतरलेली असते. बाकी वर्षभर शिरा हा प्रसादासारखा कधीही लागत नाही.

सत्यनारायणाच्या पूजेत आवर्जून तीर्थ म्हणून दिले जाणारे पंचामृत हे शेतात बायोकल्चर म्हणून वापरले जाऊ शकते याची कल्पना आहे ? साता-यातील एक अवलिया शास्त्रज्ञ श्री शेखर कुलकर्णी यांनी त्यावर एक प्रयोग केला. त्यांनी आपल्या गच्चीवरील मातीविरहित बाग पंचामृताच्या साहाय्याने तयार केली. दूध, दही, साखर, मध आणि तूप हे एकत्र करून पंचामृत तयार केले. श्री. कुलकर्णी यांनी एका कुंडीत सर्वात खाली नारळाच्या शेंड्या टाकल्या. त्यावर दोन चमचे पंचामृत टाकले. त्यावर घरातला ओला कचरा टाकून पुन्हा दोन चमचे पंचामृत टाकले. असेच दोन थर तयार करून एक झाड सोबत असलेल्या मातीसहीत लावले. पुढील २१ दिवसात पंचामृताने कच-याचे विघटन केले आणि झाड तरारून वाढले. त्यानंतर त्यात रोजचा कचरा टाकून झाडाला वाढवले. अशा प्रकारे त्यांनी गच्चीत अनेक झाडे फुलवली आहेत. पूर्वी पंचामृत हे तुळशीच्या झाडाखाली टाकले जाई. आणि तुळशिखालील माती ही गांधीलमाशी किंवा मधमाशी चावल्यावर औषध म्हणून लावली जाई. याचा अर्थ पंचामृत हे ख-या अर्थाने अमृत आहे हे आपल्या पूर्वजांना माहीत होते.

सत्यनारायणाची पूजा मला सर्वात जास्त का आवडते ते सांगू ? या पूजेच्या निमित्ताने एकाच दिवशी जवळजवळ शंभर परिचित घरी येतात आणि घर हे घरासारखे वाटते. इतरवेळी कोणालाही घरी यायचे निमंत्रण द्या, आपण बोलावतो, लोक हो म्हणतात पण येतीलच याची खात्री नसते. पण तिर्थप्रासादाला या असे सांगितले तर आवर्जून सहकुटुंब येतात. देवाचे दर्शन घ्यायचे असल्याने कोणाच्याही मनात दुस-याबद्दल वाईट विचार नसतात. ती एक प्रसन्न संध्याकाळ असते. सर्वाना एकप्रकारची पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते. ती दिसत नाही, दाखवता येत नाही पण अनुभवता मात्र जरूर येते. आजच्या तरुण पिढीला पाच हजार फेसबुक फ्रेंड असतात पण व्यक्तिगत जीवनात भेटणे, बोलणे हे त्यांना आवडत नाही. सत्यनारायणाच्या पूजेच्या निमित्ताने त्यांना घडलेला माणसांचा सहवास हा त्यांना नक्कीच आयुष्यात उपयोगी पडतो.

एक छोटीशी पूजा, पण एवढा मोठा अर्थ सांगून जाणारी ! लोकांना एकत्र आणणारी ही पूजा काळाची गरज नव्हे काय ? आज प्रत्येकजण एकमेकांपासून शरीराने आणि मनाने दूर गेलाय. त्यामुळे आजपर्यंत नव्हती इतकी गोष्टींची गरज निर्माण झाली आहे. कोणाला पटो किंवा न पटो, या धार्मिक रूढी, परंपरा लोकांमधला आपपरभाव नाहीसा करून मानवतावाद शिकवतात. मग टीकाकार काहीही म्हणोत.

मुळात हिंदू धर्म आणि आपण म्हणजे हत्ती आणि सात आंधळे यांच्या गोष्टींसारखे आहोत. जशी ज्याची नजर तसे त्याचे आकलन ! कोणत्याही धर्मावर टीका करणे खूप सोपे आहे कारण त्या टीकेसाठी खूप बुद्धी लागत नाही, फक्त मनात द्वेष असला म्हणजे झाले. मला नेहमी प्रश्न पडायचा की हिंदू धर्मालाच का इतके टार्गेट केले जाते ? विचाराअंती लक्षात आले की लोक फळांनी डवरलेल्या झाडालाच दगड मारतात, वठलेल्या किंवा काट्यांच्या झाडाला नव्हे ! तसेच हेही…….

क्रमशः….

© श्री अभय शरद देवरे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सत्यनारायण पूजा : काळाची गरज – भाग 1 ☆  श्री अभय शरद देवरे

? विविधा ?

☆ सत्यनारायण पूजा : काळाची गरज – भाग 1 ☆  श्री अभय शरद देवरे ☆ 

नुकतीच घरी सत्यनारायणाची पूजा यथासांग पार पडली. ही पूजा गेल्या कित्येक वर्षांपासून दर श्रावणात आणि मंगल कार्य झाल्यावर आमच्या घरात केली जाते. इतक्या वर्षात ती अंगवळणीही पडली आहे पण सोशल मीडियावर व्यक्त होणे जसे सोपे झाले तसे हिंदू धर्मावरील जहरी फुत्काराना उधाण आले.काही महाभाग तर केवळ त्या एका उद्दिष्टासाठीच जगू लागले. ( त्यांना त्यासाठी पैसे मिळत असावेत बहुतेक ) श्रावणापासून सुरू झालेले सण धुलीवंदनाच्या दिवशी संपतात पण सन्माननीय टीकाकार मात्र वर्षभर या सणांवर टीका करण्याचे इतिकर्तव्य वर्षभर पार पाडतात. कॉपीपेस्ट केलेल्या म्हणजेच चोरलेल्या या पोस्ट एखाद्या संसर्गजन्य आजाराप्रमाणे सर्वत्र पसरतात. त्यात मांडलेले मुद्दे इतके प्रभावी असतात की माझ्यासारख्या श्रद्धेय माणसाच्याही श्रद्धा डळमळीत होऊ पहातात. हिंदू धर्म म्हणजे जातीयवादी, परंपरावादी, स्पृश्यास्पृश्य मानणारा, एका विशिष्ठ समाजाच्या हातात सर्व अधिकार ठेवणारा अशा अनेक शेलक्या शेलक्या विशेषणांनी संभावना केली जाते. कोण तो मनू….जो  काळा का गोरा हे माहीत नसतो किंवा त्याचा तो कुप्रसिद्ध मानला गेलेला ग्रंथ मुळापासून संस्कृतमधून वाचणे तर सोडाच पण साधा पाहिलेलाही नसतो, तरी पण त्याच्यावर आणि त्याला चिकटवलेल्या जातीवर, पीएचडी केल्यासारखे असंख्य महामहोपाध्याय तुटून पडतात. तेंव्हा असे वाटून जाते की खरेच आपला धर्म इतका वाईट आहे का ?

मग मी माझ्या अल्पबुद्धीने या धर्मातील रूढी परंपरांमागचा विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. विचार करु लागलो की कोडी सहजपणे सुटत जातात आणि माझ्या प्राणप्रिय धर्माची महानता समजू लागते. दरवर्षी घरात होणारी सत्यनारायणाची पूजा हीसुद्धा अशीच एक आदर्श परंपरा आहे. मला माहित नाही की सत्यनारायण या नावाचा देव खरच आहे का ते ! मला माहित नाही की तो साधुवाणी, कलावती किंवा लीलावती ही पात्रे खरेच होती का ? मला माहित नाही की हे व्रत न पाळल्यामुळे देव शिक्षा करतो का ते ! तरीही मी पूजा करतो कारण त्यातून मिळणारे आत्मिक समाधान मला शब्दात वर्णन करता येत नाही पण अनुभवता मात्र जरूर येते.

नेमके प्रत्येकाच्या घरात काय घडते जेंव्हा सत्यनारायणाची पूजा केली जाते तेंव्हा ? पूजा होणार म्हणून दोन दिवस अगोदर गृहिणी घराच्या साफ़सफाईला लागते. जाळेजळमटे, अडगळ काढून टाकली जाते. स्वच्छतेतून निर्माण होणारी धार्मिकता घरात वावरू लागते. पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदीविक्रीतून आपोआपच मार्केटमध्ये पैसे फिरू लागतो. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी हे सण अनेक लोकांना अन्नाला लावतात. सत्यनारायणाची पूजा हीसुद्धा त्याला अपवाद नाही. ही पूजा जर कोणी नाही केली तर फुले, फळे, सुपारी, हळद, नारळ, तांदूळ, गहू, रवा, साखर दूध, आदी उत्पादकांना त्याकाळात वाढीव ग्राहक मिळणार नाही.

पूजेसाठी लागणा-या दुर्वा, पत्री, प्रसाद यांचे केवळ धार्मिक महत्व नाही तर या सगळ्या गोष्टींचा औषधी उपयोग आहे. म्हणूनच शास्त्रकारांनी पूजेत वापर करायला सांगितला आहे. हिंदू धर्मातील कोणतीही रूढी, परंपरा ही माणसाला निसर्गाच्या जवळ नेते आणि निसर्गाचे संवर्धन करायला शिकवते. पूजेनंतर वाटला जाणारा प्रसाद हा अनारोग्यातून आरोग्याकडे जाणारा एक राजरस्ताच आहे. प्रसाद भक्षण करून आपण विविध रोगांना आपले भक्ष्य बनू देत नाही हे आपल्या लक्षातच येत नाही. सोशल मीडियावर एक लेख आला होता तो जसाच्या तसा समोर ठेवत आहे.

देवाला नैवेद्य दाखवणे हा पूर्ण भक्तीयोग आहे. त्यातील विज्ञान योग कोणता ते पाहू.

क्रमशः….

© श्री अभय शरद देवरे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 48 ☆ फुलपाखरू… Butterfly ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

?  साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 48 ? 

☆ फुलपाखरू… Butterfly ☆

फुलपाखरू… किती निर्मळ आणि स्वच्छंदी जीवन असतं त्याचं…, जीवशास्त्र हे सांगतं की फुलपाखराचे आयुमान फक्त चौदा दिवसाचं असतं… तरी सुद्धा ते किती आनंदात जगतांना आपल्याला दिसतं… या फुलावरून त्या फुलावर लीलया उडतं, जीवन कसं जगावं याचा परिपाठ जणू ते सर्वांना शिकवत असतं…आपल्याच विश्वात रममाण असणारं हे फुलपाखरू खरेच एक आदर्शवादी कीटक आहे… वास्तविकता त्याला पण खूप शत्रू परंपरा लाभलेली आहे, तरी सुद्धा तो आपला जीवनक्रम विना तक्रार पूर्ण करतं… या उलट शंभर वर्ष वयाचा गर्व असणाऱ्या माणसाला नेहमीच आपल्या कार्याचा, आपल्या नावाचा, आपल्या पदाचा गर्व असतो, तो त्या गर्वातच संपून सुद्धा जातो… अहो शंभर वर्ष आयुष्य जरी माणसाचं असलं, तरी मनुष्य तितका जगतो का…? यदाकदाचित एखादा जगला तरी… ” वात, कफ, पित्त…”  हे त्रय विकार त्याला शांत जीवन जगू देतात का…? अगणित विकार उद्भवुन लवकर मरण यावे म्हणून हा मनुष्य देवाला साकडं घालत असतो… मग काय कामाचं ते शंभर वर्षाचं आयुष्य. आणि म्हणून मला फुलपाखरू खूप आणि खूपच आवडतं… *( short but sweet life… )

एक चांगला गुरू म्हणून मी त्याकडे नेहमी पाहतो, जीवन जगण्याची कला मी त्याकडूनच अवगत केलीय… जेव्हा जेव्हा मी उदास होतो, मला कंटाळा येतो, तेव्हा मी फुलपाखराला आठवतो… मला एक लहानपणी कविता होती, फुलपाखरू छान किती दिसते, फुलपाखरू… आणि तेव्हापासून त्याची आणि माझी घट्ट मैत्री झाली आहे…

My dear friend the butterfly… forever 

शेवटी एकच सांगावे वाटते की इथे आपले काहीच नाही, सर्व सोडावे लागणार आहे, मग कशाला उगाचच व्यर्थ गर्व करून रहावं… प्रेम द्या प्रेम घ्या, आणि प्रेमानेच मग मार्गस्थ ही व्हा…!

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ज्येष्ठतेचा ‘देहशतवाद’.. ☆ सुश्री वैशाली पंडित

? विविधा ?

☆ ज्येष्ठतेचा ‘देहशतवाद’.. ☆ सुश्री वैशाली पंडित ☆ 

(मजेशीर हलका फुलका लेख जरूर वाचा)

ज्येष्ठ नागरिक या इयत्तेत प्रवेश केला की पहिल्या दिवसापासूनच सावध रहावं लागतं.आता मागच्या इयत्तांतल्या पाठ्यपुस्तकांचा अर्थातच काय्येक उपयोग नाही. नवा अभ्यासक्रम, नवनवीन चाचणी परीक्षा, त्याही ठराविक वेळापत्रकानुसार वगैरे फाजील लाड नाहीत. अचानक परीक्षा जाहीर की बसा सोडवत पेपर. अभ्यास चांगला झालेला असेल तर व्हालच पास. अन्यथा भोगा…!

तर ‘ज्येष्ठ’ झाल्यावर ‘ताबा’ हा पहिला धडा सतत पाठ करावा लागतो.बरं तो नुसता घोकंपट्टी करून नव्हे; तर आचरणात आणावा लागतो तरच आरोग्याच्या सीमेवरचे सैनिक आपलं रक्षण करतात.

कसला ताबा ?

कुणावर ताबा ?

 अर्थातच  पहिला ताबा जिभेवर !

 आत्तापर्यंत काय खाल्लं काय पचवलं, काय नाही पचवलं याचा सव्याज हिशेब फेडायची वेळ आलेली असते.ज्येष्ठत्व आता आहारातही दिसणं सक्तीचं असतं. मनाला येईल तेव्हा हाणायचे दिवस मागे पडले.आपल्याला काय आणि किती खाल्लेलं पचतं हे स्वतःला प्रामाणिकपणे विचारूनच ठरवावं लागतं.

” ओ, आता अरबटचरबट खाणं बंद करा.”

” आता आम्हाला सांगायची वेळ आणू नका तुम्ही खाण्यावरून.”

असे सल्ले आपल्या मुलाबाळांकडून ऐकणं कमीपणाचं वाटत असेल तर मुळात तशी वेळच का आणा आपण ?

दुसरा ताबाही जिभेवरचाच.पण तो मिताहाराबरोबरच मित शब्दांचा.

खूप काही शेकडो, सहस्र, लाखो, अनंत गोष्टी खटकू लागलेल्या असतात आता.अगदी फडाफड सुनवावं नि सरळ करावं एकेकाला असं वाटत असतं… कबूल… पण सबूर… आता मनात आलेले विचार आणि तोंड यांच्यात एक बारीक जाळीची चाळणी फिट करून घ्यायची.म्हणजे मनातले शब्द बुळुक्कन बाहेर येणार नाहीत.तारतम्याने चाळूनच शब्दयोजना व्हायला हवी.

तीही आवश्यकता भासली तरच ! उगाचच मुलाबाळांच्या ज्यात त्यात आपलं नाक खुपसून तोंडाची चाळण उघडायची नसतेच मुळी.

विचारला(च समजा ) सल्ला तर मनापासून द्यावा पण तो ऐकावाच असा आग्रह बिल्कूल धरू नाही.त्यावरून रूसू रागवून आपली शोभायात्रा तर मुळीच काढून घेऊ नाही.

ज्येष्ठ ‘अगं’ ना निदान घरकामातल्या लुडबुडीचा थोडा तरी विरंगुळा असतो.पण ‘ अहों ‘ ना तोही नसतो.रिकामपणत्यांना त्रास देतं नि अहो अगंना छळतात.नको जीव करतात.अहो आणि अगंना आता एकमेकांच्या दुख-या नसा पुरत्या माहीत झालेल्या- असतात.अशा वेळी दोघांनी गुण्यागोविंदाने भांडत बसावं.एकमेकांच्या औषधपाण्याची मधूनच भांडणाच्या एपिसोडमध्ये ब्रेक घेऊन आठवण करावी.

दुर्दैवाने एकटा जीवच या इयत्तेत असेल तर मात्र स्वतःचा अभ्यासक्रम स्वबळावरच पूर्ण करावा लागतो.त्यासाठी स्वयंसमुपदेशनाची सवय लावून घ्यावी लागते.

आता शरीर आपल्याकडे कर्जफेडीचा तगादा लावत असतं.तिकडे प्राधान्याने लक्ष द्यावं लागतं.

चालतानाही प्रत्येक पाऊल अत्यंत सावधगिरीने टाकावं लागतं.वा-यावर उधळून घेणा-या तरूणपणासारखं आता किधर भी देखना न् किधर भी चलना चालतच नाही.चालता चालता आता इकडे तिकडे बघायचे दिवस संपलेले आहेत.पायांकडची नजर हटी तो दुर्घटना घटीच समजा.

देह नावाचा प्राणी आता त्याच्याकडेच…त्याच्याकडेच्च लक्ष द्यावं म्हणून हटून बसलेला असतो.

लहरी झालेला असतो. त्याची लहर केव्हा, कशी फिरेल हे खुद्द आपल्यालाही कळत नसतं.

त्या देह नावाच्या प्राण्याच्या प्रत्येक अवयवाची मिजास आता पुरवावी लागते.

आत्ता आत्तापर्यंत सुरळीत असणारा एखादा बारकुस्सा स्नायूसुद्धा कधी तुम्हाला वेठीला धरील सांगता येता नाही.सुखासुखी बसलेलो असताना उठताना कमरेतून सणकच काय येईल, पोटरीतून वळच काय येईल,मस्तकातून भिरभिरंच काय फिरेल काय काय मजामजा होईल काही विचारायचं कामच नाही.

प्रत्येक हालचाल करताना मुळी आता त्या त्या अवयवाची परमिशन घेतल्याशिवाय चालणारच नाही ते !

पायांनो, उठून उभं राहू का ?मानेबाई,मागे वळून बघितलं तर चालेल का ?*

दंडाधिका-यांनो, जिन्याच्या कठड्याला जोरात धरलं तर तुमची काही हरकत नाही ना ?

दंतोपंत, कणीस खाताना त्यातच नाही ना मुक्काम करणार ?

अगदी हातापायांच्या चिरमुटल्या करंगळ्याही वरपक्षाकडच्या करवल्यांसारख्या मिजाशीत मुरडतात कधीकधी.

असे देहाचे लळे आता पुरवावेच लागतात; नाहीतर तो ‘देहशतवाद’ आपल्या जगण्याचा सगळा नकाशाच बदलून टाकू शकतो.वेगवेगळ्या व्याधींची अफाट शस्त्रसेना आणि असहाय्यतेचा दारूगोळा त्याच्या पोतडीत ठासून भरलेला असतो.

हे सगळं  त्या इयत्तेतच जायच्या आधीच माहीत करून घेतलं तर या असल्या देहशतवादाशी सामना करावाच लागणार नाही.पटतंय ?

 

सुश्री वैशाली पंडित

(व्हाॅटस्अॅप वरून साभार)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print