मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अष्टपैलू आचार्य… ☆ श्री सुरेश नावडकर ☆

श्री सुरेश नावडकर
? इंद्रधनुष्य ?

☆ अष्टपैलू आचार्य ☆ प्रस्तुती – श्री सुरेश नावडकर ☆

एकोणीसावं शतक संपताना पुण्याजवळील सासवड येथील कोडित खुर्द गावात १३ आॅगस्ट १८९८ साली, एक ‘सरस्वती पुत्र’ जन्माला आला.. ज्यानं अवघ्या ७१ वर्षांच्या आयुष्यात साहित्य, नाट्य, चित्रपट, पत्रकारिता, राजकारण, शिक्षण, इ. क्षेत्रात मोलाची कामगिरी केली.. त्यांचं नाव, प्रल्हाद केशव अत्रे!

पाचवीत असतानाच, माझ्या वडिलांनी ‘मी कसा झालो’ हे अत्र्यांचं पुस्तक वाचायला हातात दिलं.. त्या पुस्तकात आचार्य अत्र्यांनी, लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत कसे घडत गेले, ते लिहिलेलं आहे. शाळेत असतानाच ‘श्यामची आई’ हा चित्रपट पाहिला.. तो हृदयस्पर्शी चित्रपट पाहून, मन हेलावून गेलं. दहावीच्या दरम्यान मी वाचनालयातून ‘कऱ्हेचे पाणी’चे पाचही खंड आणून, वाचून काढले.. 

नाटक-चित्रपटांच्या जाहिराती करताना, आचार्य अत्रे यांच्या लग्नाची बेडी, मोरुची मावशी, तो मी नव्हेच, भ्रमाचा भोपळा, प्रितीसंगम, ब्रह्मचारी या नाटकांच्या जाहिराती केल्या. थोडक्यात, आचार्य अत्रेंना जरी प्रत्यक्ष मी पाहिलेलं नसलं तरी त्याचं साहित्य वाचून, नाटक व चित्रपट पाहून त्यांना गुरुस्थानी मानलं..

आचार्य अत्रे इतके भाग्यवान की, राम गणेश गडकरींच्या ते संपर्कात होते. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे शिष्य, राम गणेश गडकरी.. राम गणेश गडकरींचे शिष्य.. आचार्य अत्रे! संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा अर्धपुतळा, आचार्य अत्रे यांच्याच शुभहस्ते बसविलेला आहे.. 

आचार्य अत्रे यांनी शालेय शिक्षणानंतर फर्ग्युसन काॅलेज  व पुणे विद्यापीठातून पदवीधर झाल्यानंतर, शिक्षक म्हणून नोकरीस सुरुवात केली. १९२८ साली लंडनमध्ये जाऊन टी.डी. ही पदवी घेतली. 

अत्रे यांची साहित्यिक व पत्रकारिता म्हणून कारकीर्द १९२३ च्या ‘अध्यापन’ या मासिकापासून सुरु झाली. २६ साली ‘रत्नाकर’, २९ साली ‘मनोरमा’, ३५ साली ‘नवे अध्यापन’, ३९ साली ‘इलाखा शिक्षक’, ४० साली साप्ताहिक ‘नवयुग’, ४७ साली सायंदैनिक ‘जयहिंद’, ५६ साली दैनिक ‘मराठा’ अशी आहे..

चित्रपटाच्या बाबतीत अत्रे यांनी सुरुवातीला कथा, पटकथा व संवाद लिहिले आहेत. १९३४ साली ‘नारद नारदी’ चित्रपटापासून या क्षेत्रात त्यांनी पदार्पण केले. ३८ साली ‘ब्रह्मचारी’ चित्रपटाची कथा लिहिली. त्यांच्या ‘ब्रॅंडीची बाटली’ या चित्रपटानेही अफाट लोकप्रियता मिळवली. १९५४ सालातील ‘श्यामची आई’ या चित्रपटाने पहिला राष्ट्रीय पुरस्कार व सुवर्णकमळ मिळविले. 

आचार्य अत्रे हे हाडाचे शिक्षक होते, त्यांनी सुरुवातीला मुंबईत काही महिने शिक्षकाची नोकरी करताना इंग्रजी, गणित, संस्कृत विषय शिकविले. नंतर पुण्यात येऊन कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे मुख्याध्यापक म्हणून १८ वर्षे काम केले. तसेच पुण्यात राजा धनराज गिरजी व मुलींसाठी आगरकर हायस्कूलची स्थापना केली. १९३७ साली नगर पालिकेच्या निवडणुकीत निवडून आल्यावर शिक्षकांसाठी ट्रेनिंग काॅलेज काढले. प्राथमिक शाळेसाठी, नवयुग वाचनमाला व दुय्यम शाळेसाठी अरूण वाचनमाला, अशी पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली.

आचार्य अत्रे यांची भाषणे त्याकाळी फार गाजलेली होती. सदानंद जोशी यांनी ‘मी अत्रे बोलतोय’ या एकपात्री प्रयोगातून त्यांच्या भाषणकलेचा आस्वाद अनेक वर्षे प्रेक्षकांना दिला. 

१३ जून हा दिवस, पाश्चिमात्त्य देशांत अशुभ मानला जातो.. १९६९ साली त्याचा प्रत्यय महाराष्ट्रात देखील आला.. याच दिवशी आचार्य अत्रे, अनंतात विलीन झाले.. त्यांचा जन्मही १३ तारखेचा व मृत्यूही १३ तारखेलाच.. विलक्षण योगायोग! त्यांना जाऊन ५३ वर्षे झालेली आहेत.. मात्र अजूनही ते आपल्याला पुस्तकातून, भाषणांतून, नाटकांतून, चित्रपटांतून आसपासच आहेत असं वाटतं.. खरंच अशी मोठी माणसं जरी शरीराने गेलेली असली तरी त्यांच्या कर्तुत्वाने शतकानुशतके, अमरच असतात..

आचार्य अत्रे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!!!

© सुरेश नावडकर

१३-६-२२

मोबाईल ९७३००३४२८४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रामप्यारी – भाग – 2 ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ? 

☆ रामप्यारी – भाग – 2 ☆ सौ अंजली दिलीप गोखले

(सुरुवातीला फक्त आठ मुलींपासून सुरू झालेली ही सेना अल्पावधीतच ४५,००० रणरागिणींपर्यत पोहोचली ..!! ) –इथून पुढे —–

*हा काळ होता अंदाजे इसवीसन १३३० चा ..!! एका पायाने लंगडा तैमुर, दिल्ली उध्वस्त करून पुढे सरकत होता ..!!

पुढील ठिकाणी येताच त्याला नवल वाटले .. लुटालूट करायला तो ज्या, ज्या गावात जाई, ते गाव अगोदरच रिकामे केलेले असे .. सर्व धनधान्य बाड-बिस्तरा घेऊन गावकरी गायब झालेले असत ..!!* 

लुटायचे, मारायचे, बाटवायचे .. पण कुणाला ..??

गावकरी विहिरीतील पाण्यात देखील कचरा आणि घाण टाकून जात .. ह्या गोष्टींमुळे, तैमुरच्या सैन्याची उपासमार होऊ लागली .. गावकरी कुठे गेले हे शोधण्यासाठी सैन्य पुढे जाई .. त्यावेळी गनिमी कावा करून, अचानक गावकरी सैन्यावर हल्ला करत आणि पळून जात ..!! दिवसा आमने सामने लढाई करायला काहीवेळ पुरुष सैनिक पुढे येत आणि हल्ला करून पळून जात ..!! रात्रीच्या वेळेत जाळपोळ आणि छुपे हल्ले ठरलेले ..!! ह्या गनिमी हल्ल्यांनी तैमुर हैराण झाला .. सैन्य देखील उपाशी राहू लागले तशी सगळ्यांची चिडचिड ही वाढू लागली ..!!

रोजच्या रात्रीच्या गनिमी काव्याने सैन्य पुरते नामोहरम झाले. रामप्यारीच्या मर्दानी युवती रात्रीच्या वेळी छुपे हल्ले करत आणि हे हल्ले करत असताना त्या काळजी घेत असत, की तैमुरच्या सैन्याला झोप मिळणार नाही ..!! हरदाई जाट, देवीकौर राजपूत, चंद्रो, ब्राम्हणी, रामदायी त्यागी ह्यांच्याकडे ह्या रात्रीच्या छुप्या हल्ल्याची जबाबदारी होती..!!

एखादी तुकडीच्या तुकडी वेगळी पाडून कापून काढणे .. तंबूला आगी लावणे, आगींमुळे हत्ती पिसाळणे, सततचे जागरण यामुळे, तैमुरचे सव्वा लाख सैन्य, अक्षरश: जेरीस आणले गेले ..!!

बरेच सैनिक तडफडून मरण पावले .. मेरठवर हल्ला केल्याचा तैमुरला आता पस्तावा होऊ लागला .. नेमक्या ह्याचवेळी, लपून बसलेले जोगराजसिंगचे सैनिक, अचानकपणे चहुबाजूंनी चालून आले ..!! 

त्यांनी सैनिकांच्या तुकड्या केलेल्या होत्या .. त्यामुळे सतत नव्या दमाचे सैन्य लढायला तयार असे ..!!

तीच कहाणी स्त्री सेनेची होती ..!! रामप्यारीने दिवसा व रात्री लढण्यासाठी, आपल्या सेनेच्या तुकड्या केलेल्या होत्या. एक तुकडी झाडांवर बसून, तैमुरच्या सैन्यावर शर-वर्षाव करे, तर दुसरी तुकडी तैमूरच्या मेलेल्या सैनिकांची शस्त्रे व दारुगोळा घेऊन त्यांच्यावरच चालवत ..!!

*पुरुष तुकडीचा म्होरक्या हरवीरसिंग गुलिया, लढाईच्या ऐन धुमाळीत, तैमुरच्या दिशेने निघाला ..!! तैमुरच्या  अंगरक्षकाना उडवून, बाहेरील कडे फोडून तो आत जातोय हे रामप्यारीने पाहिले मात्र, ती आपल्या तुकडीसहित, त्या धुमाळीत त्याच्या रक्षणार्थ उतरली, आणि सपासप सैनिक कापत, रामप्यारी बाईची स्त्री सेना, तैमुरच्या जवळ पोचली..!!

चपळाईने लढणाऱ्या स्त्री सैनिकांना पाहून, तैमुरचे सैनिक पुरते गोंधळले .. हरवीरसिंगच्या रक्षणार्थ आलेल्या ह्या स्त्री सेनेचा धोका, खिजराखानने ओळखला .. त्याने तैमुरचा घोडा खेचून, सटकण्याचा प्रयत्न केला .. त्यात तो काहीसा यशस्वीही होत होता तोच, २२,००० सैनिकांची दुसरी आणि अंतिम तुकडी घेऊन, ताज्या दमाने जोगराजसिंग मैदानात उतरले .. घमासान लढाई पेटली .. तैमुर चक्क पळून जात होता .. रामप्यारीने त्याला पाहिले व पळणाऱ्या तैमूरचा  पाठलाग चालू केला ..!!

रामप्यारी घोड्यावर आणि तैमुर देखील घोड्यावर ..!! तैमुरने चिलखत घातले होते. चिलखतातून दिसणा-या तैमुरच्या काखेच्या उघड्या भागावर, रामप्यारीने दौड घेतानाच, बाण चालवले. रामप्यारीने त्याला गाठून त्याच्यावर तलवार देखील चालवली .. पण विष लावलेले बाण शरीरांत शिरल्याने तैमुर बेशुद्ध होऊन घोड्यावरून पडला ..!!

खिजराखानला मागे येताना बघून रामप्यारी मात्र जंगलात नाहीशी झाली ..!!

ह्या जबरदस्त प्रतिहल्ल्याने घाबरून, तैमुर भारतावरील आक्रमण व त्याचे मनसुबे गुंडाळून, समरकंदला पळून 

गेला ..!! गळा, छाती तसेच बगलेतील जखमांमुळे, तैमुर लवकरच मेला ..!!

अशा ह्या ‘पळपुट्याचे’ तिकडे शूर योद्धा आणि महान धर्मप्रसारक म्हणून पुतळे उभे आहेत ..!!

आणि इथे त्याचे नांव, आपल्या मुलाला दिले जात आहे ..!!

*देश, धर्म, संस्कृतीच्या रक्षणासाठी, एकीकरण व स्त्री सक्षमीकरण करून प्रत्यक्ष युध्दात उतरणाऱ्यांना भारतीय लोक विसरले ..!!

पण त्यांनी पळपुटेपणा केलेला तैमुर मात्र लक्षांत ठेवला ..!!

तैमुरसारख्या नराधमाला समोर गाठून, त्याला विदीर्ण करणाऱ्या रामप्यारीबाई चौहानला देखील भारतीय लोक पार विसरून गेले .. कारण हा खरा इतिहास आम्हाला कधीच शिकवलाच गेला नाही ..!!*

तैमुर आला हे शिकवलं गेलं, पण तो घाबरून पळाला, हे आम्हाला कधीच शिकवलं गेलं नाही ..!

रामप्यारीला मानाचा मुजरा ..!!

—समाप्त— 

संग्राहिका : सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रामप्यारी – भाग – 1 ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ? 

☆ रामप्यारी – भाग – 1 ☆ सौ अंजली दिलीप गोखले

तैमुर आला हे शिकवलं गेलं, पण तो घाबरून पळाला, हे आम्हाला कधीच शिकवलं गेलं नाही ..!! आता, नवीन शिक्षण पद्धतीमध्ये, आम्हाला आमचा ‘खरा’ इतिहास शिकवला जाईल ..!!

वाचा …

समरकंद म्हणजेच सध्याचा उझबेकिस्तान .. तिथला क्रूर शासक तैमूर ..!! भारत जिंकून इथे धर्मप्रसार करावा या उद्देशाने तो भलंमोठं सैन्य घेऊन निघाला ..!!

अफगाणिस्तानातील गझनवी शासकांना त्याने हरवले. सर्वांना माहीतच आहे की, तो अत्यंत क्रूर, निर्दयी, 

दुष्ट होता ..!!

.. त्याच तैमुरला, एका रणरागिणीने अक्षरश: जेरीस आणले होते ..!!

ती होती रामप्यारीबाई चौहान ..!!

तैमुरच्या अत्याचाराचे किस्से वाचून, कुणाचाही थरकाप उडेल ..!! अफगाणिस्तानचा प्रदेश जिंकून, हाच तैमुर, हरिद्वार, हरियाणा, दिल्लीच्या रोखाने, पंजाब उध्वस्त करून निघाला .. वाटेत येणाऱ्या लहान मोठ्या राजांनी प्रतिकार केला देखील .. पण, तैमुरच्या विशाल सेनेपुढे कुणाचाही टिकाव लागू शकला नाही ..!!

राजे महाराजे थकले तरी, भारतीय जनता मात्र हार मानणारी नव्हती ..!!

उत्तर भारतात त्याकाळी असणाऱ्या विविध जातींच्या प्रमुखांनी, देश, धर्माच्या रक्षणासाठी एक समिती तयार केली ..!!

आमने सामने लढून आपला निभाव, तैमुरसमोर लागणार नाही, याची त्यांना पूर्ण कल्पना असल्याने, त्यांनी गनिमी काव्याने लढायचे ठरवले ..!!

जोगराजसिंग परमार ह्यांना त्या सर्वानी आपल्या नवीन सैन्याचे प्रमुख बनवले ..!! गावोगावचे तरुण लढण्यासाठी

 आले ..!!

पण आजपर्यंत कोणीही शस्त्र हाती धरलेले नसल्याने, त्या सर्वांचे प्रशिक्षण जरुरीचे होते ..!!

तरीही त्यांचा आपल्या नेत्यावर पूर्ण विश्वास होता. जोगराजसिंग ह्यांनी, त्या सर्व ‘सेनेला’ प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली ..!!

इसवी सन 1305 मध्ये, हरिद्वार जवळील कुंजासनहाटी गावात जन्मलेले जोगराजसिंग एक छोटे संस्थानिक होते ..!! इस्लामी आक्रमकांनी त्यांचे संस्थान लुटून, जाळून नष्ट करून टाकले होते ..!!

यामुळे जोगराजसिंग गावोगावी फिरून, ह्या ‘हिरव्या’ संकटाशी लढायला युवकांना प्रेरित करत होते ..!!

यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, तब्बल ८०,००० युवकांची सेना, देशभरातून तयार झाली होती ..!!

सर्व जाती-जमातींची महापंचायत, पुन्हा एकदा विचार-विनिमयास बसली .. त्यांच्यासमोर वेगळाच प्रश्न उभा झाला होता .. गावो-गावच्या युवतीही लढायला तयार झाल्या होत्या .. सर्वानी एकमताने ठराव मंजूर केला की, स्त्री सेना तयार करून, त्यांनाही लढण्याचे प्रशिक्षण द्यायचे ..!! अशाप्रकारे, तब्बल ४५,००० युवतींची ‘स्त्री सेना’ तयार 

झाली ..!! त्यांची सेनापती होती रामप्यारीबाई चौहान ..!!

कोण होती ही रामप्यारी बाई चौहान ..??

उत्तरप्रदेश मधील सहारनपूर गावात, रामप्यारीबाई चौहानचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला ..!!

लहानपणापासून इस्लामी आक्रमकांच्या भयकथा ऐकून, रामप्यारीचे मन पेटून उठत होते ..!!

अन्यायाचा प्रतिकार करायचा तर, शरीर मजबूत हवे ..!! शरीर मजबूत करण्यासाठी व्यायाम केला पाहिजे .. त्यासाठी रामप्यारी रोज सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर, आपल्या शेतात जाऊन, सर्व प्रकारचे व्यायाम करत असे .. व्यायाम करून आपले शरीर तिने दणकट बनवले होते ..!! 

गांवकरी त्याबद्दल तिच्यावर टीका करीत पण तिचे आई-वडील मात्र तिच्यामागे ठामपणे उभे राहिले होते .. एकदा पंचायती समोर तिने गावक-यांना ह्याचे महत्त्व पटवून सांगितले ..!! 

इस्लामी आक्रमकांचा मुकाबला करायचा असेल तर, आपणच आपले शरीर मजबूत केले पाहिजे .. तिने सांगितलेला हा उपाय सहजसाध्य होता, आणि सर्वाना पटला होता ..!!

*मग काय .. गावोगावी अशी व्यायाम शिबिरे होऊ लागली ..!!

सुरुवातीला फक्त आठ मुलींपासून सुरू झालेली ही सेना अल्पावधीतच ४५,००० रणरागिणींपर्यत पोहोचली ..!!

क्रमशः…

 

संग्राहिका : सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बिचारा तेरा… ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ? 

बिचारा तेरा ☆ श्री सुहास सोहोनी ☆ 

अंधश्रद्धांचं पीक जगभर उगवतं, वारेमाप वाढतं ! त्याला एक सुद्धा देश अपवाद नाही.

ग्रीक-रोमन संस्कृतीत १३ हा आकडा बिचारा फुटक्या नशिबाचा आहे. अशुभ आहे. घातकी आहे. कृतघ्न आहे. सर्व घाणेरडी बिरुदं चिकटलेला हा १३ ! पूर्वीच्या काळाचं सोडा, अगदी आजही हजारो युरोपियन्स्, ख्रिश्चन्स् या १३ ला टरकून असतात ! आकडे मोजतांना, नंबरिंग करतांना १२ नंतर एकदम १४ मोजतात !! १२ बिस्किटं खाऊन झाल्यावर १३ वं  न खाता एकदम १४ वं  खातात. सगळाच खुळ्यांचा बाजार !

या १३ आकड्याच्या भीतीला म्हणतात Triskaidekaphobia!

ट्रिस्कायडेकाफोबिया !! … हुश्श्श् !!

😄

१३ तारीख अगदी टाकावू– कोणतीही कामे करण्यास. लढाया, अवजड उद्योग यांचा मुहूर्त ठरवतांना १३ तारीख येत नाही ना हे कांटेकोरपणे पाहिलं जातं. त्यासाठी इतर अडचणी पत्करल्या जातात.

१३ तारखेच्या या टरकूपणाला नांव आहे –

Paraskevi Dekatria Phobia

पॅरस्केविडकॅट्रियाफोबिया !! …

हुश्श्श्श्श्श्श्श्श् !! (शची संख्या वाढल्येय् इकडे कृपया लक्ष असावे, ही विनंती ! 😄 )

युरोपातल्या  इमारतींच्या लिफ्टमधून मजल्यांचे आकडे तर दिसतातच, त्यात १३च्या जागी रक्ताळलेल्या हृदयाचे चित्र काढलेले असते !

विमानांच्या हॅंगर्सना नंबर देतांना ११, १२, १२-A, १४, १५ असे दिले जातात.

असे किती प्रकार ! आपल्याकडे सुद्धा अनेक ठिकाणी राजकारण्याच्या अनेक कामांत आकड्यांची गिनती सोईनुसार सोडली जाते. पण ती अंधश्रद्धा नव्हे. गणपतीच्या सहस्रनामपूजेत अनेक भटजीबुवा एक सोडून एक नांव वाचतात ! ही पण अंधश्रद्धा नव्हे ! याला म्हणतात बेरक्यांचा इरसालपणा … !!

असो. चालायचंच !

आणि १३ तारीख शुक्रवारी येत असेल तर अति अति वाईट !

मागच्या शुक्रवारी नेमकी १३ तारीख होती ! १३ एप्रिल २०२२. जे अंधश्रद्धेला न हसता घरीच बसले, कोणतंही काम केलं नाही,  नवीन काम काढलं नाही. घराबाहेर पडले नाहीत – त्यांनी शुक्रवार घरच्या घरीच मनमुरादपणे साजरा केला … त्याचा काठोकाठ आनंद लुटला …अंधश्रद्धा मातेचा विजय असो … ॥

😄

️️️️️©  सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ७ जून : जागतिक पोहा दिन… संकलन : मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ ७ जून : जागतिक पोहा दिन… संकलन : मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

७ जून हा जागतिक पोहा दिन म्हणून साजरा केला जातो. पोह्यांचा नाश्ता माहित नाही असं एकही कुटुंब सापडणार नाही. प्रत्येक प्रदेशानुसार, पोहे करण्याची पद्धती आणि चव बदलते. पोह्याचा नाश्ता चविष्ट तसेच आरोग्यदायी देखील आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात पोह्याच्या नाश्त्याला पंसती आहे. जे लोक डायटिंग करतात. त्यांच्यासाठी पोह्यांचा नाश्ता अत्यंत आरोग्यदायी समजला जातो.

महाराष्ट्र, ओडिसा, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात आणि राजस्थान मध्ये पोह्याचा नाश्ता प्रसिद्ध आहे. भारतात पोह्याचा शोध नेमका कुठे लागला हे कोणाला माहिती नाही. 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पोह्यात ७६.९ टक्के कार्बोहाड्रेटस आणि २३.१ टक्के प्रोटीन असते. वजन कमी करण्यासाठी पोहे फायदेशीर मानले जातात. 

आज या लेखात जागतिक पोहे दिनानिमित्त पोहे खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात.

कार्बोहायड्रेटस चा उत्तम स्त्रोत :

पोह्यात ७६.९ टक्के कार्बोहाड्रेटस असतात. तसेच पोह्यात २३ टक्के फॅट्स असतात. कार्बोहायड्रेटस मुळे शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे सकाळी पोह्याचा नाश्ता आरोग्यदायी मानला जातो.

शरीराला लोहाचा पुरवठा होता :

पोह्यात लोहाचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. पोहे तयार करण्याच्या प्रक्रियेत तांदळावरून लोखंडी रूळ फिरवले जातात. या प्रक्रियेत लोह्याचा अंश पोह्यात शिरतो. त्यामुळे यात लोहाचे प्रमाण अधिक असते.

रक्तातील साखरेवर नियंत्रण :

मधुमेहाच्या रुग्णांसाठी पोह्यांचा नाश्ता आरोग्यदायी मानला जातो. पोह्यात फायबरचे प्रमाण अधिक असते. पोह्याच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते.

पचनास हलके :

पोह्यांचा नाश्ता पचनास हलका असतो. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात त्याचा समावेश केला जातो. पोह्यामुळे पोट भरलेले राहते आणि खूप कमी लागते.

लठ्ठपणा येत नाही :

पोहे खाल्ल्याने लठ्ठपणा वाढत नाही. एक वाटी पोह्यामध्ये कमीत कमी २५० कॅलरीज असतात. तसेच पोह्यांमध्ये व्हिटामिन, मिनरल आणि अँटी ऑक्सिडंट असतात.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

प्रस्तुती : बिल्वा अकोलकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ न्यायप्रिय राजमाता… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

Ahilyabai Holkar 1996 stamp of India.jpg

न्यायप्रिय राजमाता… ☆  प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर

इंदौरच्या आडाबाजार परिसरात राणी अहिल्यादेवी बाहेर पडल्या आहेत, रस्त्यावर एक गायीचं वासरू रक्तबंबाळ अवस्थेत मृत्युमुखी पडलेलं दिसतंय, त्याच्या बाजूला गाय हंबरतेय, चाटतेय, तिच्या डोळ्यातून डोंगराएवढं दुःख डोळे भरून वाहतंय, एक आई आपल्या मुलाच्या मृत्यूने घायाळ झालीय, त्या वेदना, संवेदना, दुःख हे सगळं त्या  गायीच्या डोळ्यात दिसतंय, तो प्रसंग माता अहिल्यादेवी पाहताहेत, बेचैन, अस्वस्थ झाल्यात !

त्या मुक्या गायीला न्याय मिळाला पाहिजे, 8- 10 दिवसाच्या त्या निष्पाप बछड्याला रस्त्यावर चिरडून निघून जाणाऱ्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, हा राग त्यांच्या मनामध्ये आहे, आपण रोज हजारो लोकांना तर न्याय देतो पण या मुक्या गायीला न्याय कोण देणार ! तिच्या 8-10 दिवसांच्या वासराची, तिची काय चूक? अहिल्यादेवी व्याकुळ होऊन आपणच न्याय दिला पाहिजे हा निश्चय करत तडक परत राजवाड्यात फिरतात, जिथे रोजचा जनता दरबार आणि न्याय देण्यासाठी बसतात त्या सिंहासनावर स्वार होतात, आपल्या सरदारांना पाहिलेली घटना सांगतात, या अमानुष घटनेला मग शिक्षा ठरते, ती शिक्षा म्हणजे थेट मृत्युदंड !

त्या घटनेची चौकशी केली जाते तर आपल्या पोरानेच त्या वासराला चिरडल्याची माहिती समोर येते. अहिल्यादेवींचा मुलगा मालेराव रस्त्याने घोड्याच्या रथातून जात असताना आडव्या आलेल्या त्या गोंडस वासराला चिरडून मालेराव पुढे निघून गेल्याची माहिती मिळते. अहिल्यादेवींनी शिक्षा तर मृत्यूदंडाची दिलीय, मग आता माघार नाही, अन माघार घेतील त्या अहिल्यादेवी कसल्या !

स्वतःचा मुलगा मालेराव त्या वासराचा मारेकरी असल्याचे ऐकून त्या किंचितही हटल्या नाहीत, विचलित झाल्या नाहीत, थबकल्या नाहीत, आणि त्यांनी तात्काळ त्या सिंहासनावरून आदेश दिला, त्या मालेरावला रस्त्यावर झोपवा अन त्याच्या अंगावरून बेफाम वेगाने घोड्याचा रथ चालवा ! त्याला मृत्युदंडच झाला पाहिजे !

सगळं सभागृह स्तब्ध झालं, चकित झालं, भयभीत झालं,  विचार करतंय—  अरे या तर मालेरावच्या आई, पोटच्या पोराला कोण रथाच्या खाली देईल! असं निर्दयी कोण मारून टाकेल! आणि गुन्हा काय तर एका 8-10 दिवसाच्या वासराला चिरडलं! काय त्या वासराची किंमत? ज्याच्यासाठी राणी अहिल्यादेवी आपल्या पोटच्या एकुलत्या एक पोराला मृत्युदंड देताहेत— पण या करारीबाण्याच्या अहिल्यादेवींना विरोध करण्याचं धाडस त्या वाड्यातल्या एकाही सरदारात नव्हतं!

एकही जण पुढे यायला तयार नाही, रथ चालवायला तयार नाही. मालेरावला मारायचं तेही सगळा आडाबाजार बघणार . ज्या राजघरण्यावर जीव ओवाळून टाकला त्या राजपुत्राला मारायचं कसं, हे पाप कशासाठी करायचं . मात्र अहिल्यादेवींच्या चेहऱ्यावर कशाचाच लवलेश नाही . उलट त्या निष्पाप गायीला न्याय मिळवून देण्याची त्यांना ओढ लागलीय . अन एकही जण पुढे येत नसल्याचं पाहून त्यांनी एक निगरगट्ट, धष्टपुष्ट आणि घट्ट काळजाच्या नोकराला आदेश दिला . रस्त्यावर मालेरावला झोपवलं, मालेराव डोळे बंद करून झोपले आहेत, कारण आता मरणातून सुटका नाही हे त्यांनीही ओळखलंय, सगळा आडाबाजार रस्त्याच्या बाजूने बघायला तोबा गर्दी करून उभा आहे.  ज्या गायीचं वासरू चिरडलं ती गायसुद्धा तिथेच स्तब्ध उभी आहे. ही न्यायप्रिय राणी स्वतःच्या पोराला मृत्युदंड देतीय. \ मात्र रथ पळत येतोय आणि थबकतोय, त्याही निगरगट्ट नोकराचं धाडस होईना, परत परत रथ बेफाम धावत येतोय, मात्र मालेरावपर्यंत पोहचायच्या आतच थबकतोय!

हे वारंवार होतंय, मात्र मालेरावला चिरडण्याचं धारिष्ट दाखवत नाही, म्हणून राणी अहिल्यादेवी स्वतःच त्या रथाच्या सारथी होतात. आता मालेरावला चिरडलं जाणार हे नक्की होतं, बेफाम रथ येतोय – मात्र मालेरावपर्यंत पोहचायच्या अगोदरच ज्या गायीचं वासरू चिरडलं ती गाय रथाच्या समोर येऊन उभी राहते, रथ पुढे जाऊच देत नाही . अहिल्यादेवी रथ परत फिरवतात पुन्हा वेगाने घेऊन येतात.  मात्र पुन्हा गाय समोर येते. तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहतंय !—

जणू ती गाय रथाच्या आडवे येऊन अहिल्यादेवींना म्हणतेय, “ बाई, पोटच्या पोराच्या मृत्यूचं दुःख मी भोगलंय, या यातना, संवेदना मी भोगल्यात. आता हे दुःख तुझ्या पदरी कशाला! आईच्या काळजाला होणाऱ्या जखमा, आईच्या आतड्याला पडणारा पिळ मी भोगलाय! माझा बछडा माझ्यापासून हिरावला पण मला न्याय देण्यासाठी तू तुझ्या बछड्याला कशाला हिरावते आहेस ! तुझ्या न्यायदानाची पद्धत आणि नीती पाहून मी माझ्या दुःखाला सुद्धा विसरून गेलेय ! “

या घटनेनं सगळा परिसर घायाळ आणि स्तब्ध झाला . लोकं अहिल्यादेवींकडे याचना करताहेत, की ही गाय त्यासाठीच आडवी येतेय की पोटच्या पोराला मारू नका! चूक झाली असेल पण त्याची शिक्षा अशी करू नका!

आणि शेवटी अहिल्यादेवींना माघार घ्यावी लागली आणि त्या तडक आपल्या राजवाड्यात परतल्या! हा त्यांच्या आयुष्यातला एकमेव निर्णय जो नाईलाजाने त्यांना माघारी घ्यावा लागला, तेही त्या गाईच्या आडव्या येऊन करणाऱ्या विनवण्यामुळे!

अत्यंत कठोर, न्यायप्रिय आणि उत्तम शासक असणाऱ्या राजमाता अहिल्यादेवींच्या वाट्याला प्रचंड संघर्ष आला, पहिल्यांदा नवरा खंडेरावांचा मृत्य, त्यानंतर सासरे मल्हाररावांचा मृत्यू, त्यानंतर मुलगा मालेरावांचा मृत्यू!

घरातले सगळे कर्ते पुरुष गेल्यानंतरही भगवी पताका खांद्यावर घेऊन महिलांची फौज तयार करत लढाया करणारी रणरागिणी माळवा प्रांताने अनुभवली. हजारो मंदिरांचा जीर्णोद्धार, मठ, धर्मशाळा, पाणवठे, पाणपोया, विहिरीचं बांधकाम, काशी विश्वनाथ, सोमनाथापासून ते परळी वैजनाथापर्यंत सगळ्या हिंदूंच्या आस्थांना नवसंजीवनी दिली. जीर्णोद्धार केला!

आमच्या छत्रपती शिवरायांनी देव वाचवला आणि त्या देवांचा जीर्णोद्धार करत आमच्याच राजमाता अहिल्यादेवींनी मंदिरांचा आणि हिंदूंचा उद्धार केला, हिंदूंची ओळख जपली.

महान पराक्रमी, योद्ध्या, न्यायप्रिय, कठोर शासक, रणरागिणी, पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन!🚩🙏

संग्रहिका – श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ १ जून राष्ट्रीय वाढदिवस दिन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ १ जून राष्ट्रीय वाढदिवस दिन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

⭕ आज राष्ट्रीय वाढदिवस दिन !

⭕ पु.ल. नेहमी म्हणायचे,

“जवळ जवळ निम्मा महाराष्ट्र जूनमध्येच जन्माला आला आहे आणि तोही गुरुजींच्या पुण्याईमुळे !”

वाढदिवस म्हटलं की लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सर्वांनाच हवाहवासा वाटणारा दिवस. 

जन्माला आल्यापासून आपल्या शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक वाढीचे आकडेवारीत मोजमाप करणारा दिवस म्हणजेच वाढदिवस. 

‘सोळावं वरीस धोक्याचं,

 ‘वीस वर्षांचा घोडा झालास तरी कळत नाही का ?’,

 ‘वयाची पन्नाशी गाठली आता रिटायर व्हा’ 

अशी आपल्याला मिळणारी सारी शाब्दिक आभूषणे आपल्याला वाढत्या वयाची जाणीव करून देत असतात.

 अर्थात प्रत्येकाचा वाढदिवस वेगवेगळ्या तारखेला साजरा होत असतो. 

काही वेळेला आपल्या फ्रेंड सर्कल मधल्या दोघा तिघांची, चार पाच जणांची जन्म तारीख एकच असू शकते, नव्हे ती असतेच.

पण १ जून हा असा दिवस आहे की,

 चाळीस पन्नास वयाच्या घरात असलेल्या थोडेथोडके नाही तर किमान ५० ते १०० जणांचे वाढदिवस १ जूनलाच असतात. 

असं काय आहे की ?—- 

१ जून हा दिवस चाळीशी पन्नाशी उलटलेल्या प्रत्येकाचाच वाढदिवस असतो.

 १ जूनचे वाढदिवसाचे गणित, संख्याशास्त्राला चक्रावून टाकणारे. 

सदर काळातील जनगणना हा तर मोठा विनोद ठरावा.

 एकाच दिवशी एक नव्हे तर अनेक गावांमधील अनेक बालके १ जूनला जन्माला यावी, यासारखे प्रशासकीय सत्य.  त्या काळातील  ‘आदर्श’ प्रकरणाचं उत्तर शोधलं असता एक इंटरेस्टिंग माहिती समोर आली.

साधारण चाळीस पन्नास किंवा त्यापूर्वी खेड्यापाड्यामध्ये सुरक्षित प्रसूतीची सोय नव्हती. सर्व काही अनुभवी सुईणीच्या हातात असायचं.

 शिक्षण सुद्धा कमी असल्याने जन्मलेल्या बाळाची जन्मवेळ तर सोडाच पण जन्मतारीख सुद्धा काही लोकांना माहित नसायची. 

मग ज्यावेळी शाळेत प्रवेश घ्यायची वेळ यायची, तेव्हा मुलाच्या पालकांना अचूक तारीख सांगता यायची नाही. 

त्यामुळे जन्मतारीख कोणती असा प्रश्न विचारला तर, तारखेच्या नजीकची एखादी घटना, एखादा सण असे ठोकताळे सांगितले जायचे. 

पण गुरुजींना exact तारीख हवी असायची..,आणि ती काही पालकांना सांगता यायची नाही.

 मग काय शाळा सुरु होण्याच्या आठ दहा दिवस आधीची तारीख गुरुजीच मुलाच्या नावापुढे लिहायचे, 

ती शाळा प्रवेशाची तारीख म्हणजेच १ जून आणि त्यापूर्वी ५-६ वर्ष हे जन्म वर्ष म्हणून लिहिलं जाऊ लागलं आणि बऱ्याच जणांना १ जून ही जन्मतारीख चिकटली. 

अगदी एका घरातल्याच सर्व भावडांची जन्मतारीखही १ जून असल्याचं दिसून येतं. 

अर्थात गेल्या तीस चाळीस वर्षात परिस्थतीत खूप बदल झाला आहे.

 जन्माच्या नोंदी सरकारी दप्तरी होऊ लागल्या आहेत. 

पण चाळीस पन्नास वर्षांपूर्वी १ जून हीच सर्वांसाठी जन्मतारीख होती.  त्यामुळेच आज बरेच जण आपला वाढदिवस या दिवशी साजरा करताहेत.

⭕ राष्ट्रीय वाढदिवस दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

 

प्रस्तुती — श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सत्यकथन ! ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ? 

☆ सत्यकथन ! ☆ श्री सुहास सोहोनी ☆ 

पूर्वीच्या लोकांचे काही आडाखे असायचे पावसाबाबत. आणि ते ते बहुतांशी सत्यात उतरायचे.

आम्ही ज्या कंपाऊंडमध्ये राहतो त्याच्या पलीकडे जोशांचे कंपाऊंड, आणि त्या पलीकडे वेलणकरांचं कंपाउंड. वेलणकरांच्या कंपाउंडमध्ये एक भला मोठा चिंचेचा वृक्ष होता. तो कमीतकमी अडीचशे-तीनशे वर्षांचा असावा, असं वनखात्याच्या अधिकाऱ्यांचं गणित होतं. एप्रिलमध्ये त्याच्यावर लाखो फुलं फुलायची. मे महिन्यात ती वाऱ्यावर गरगरत खाली जोश्यांच्या कंपाउंडमध्ये पडायची. आमच्या घराच्या मागच्या पडवीत ती फुलं पडली की चोवीस तासात पाऊस हजर होणार, हे आमच्या आईचं निरीक्षण होतं. तसं तिचं भाकित ती सांगायची. आणि विशेष गोष्ट म्हणजे गेल्या सत्तर वर्षांत माझ्या डोळ्यांसमोर ते भाकित कधीच चुकलेलं नाही !! 

दोन वर्षांपूर्वी तो चिंचेचा भला मोठा वृक्ष कोसळला! आता पर्जन्यागमनाचं भाकित घरच्या घरी करण्याची सुविधा देणारा तो भविष्यवेत्ताच हरपला!

अशी अनेक विषयांच्या वरची भाकितं जुनी मंडळी करायची आणि ती सहसा चुकत नसत. कारण त्यामागे निसर्गाचं खोल निरीक्षण, अनुभव, तर्कबुद्धी आणि अभ्यास असायचा.

मृगाचे किडे कधी दिसतील, भारद्वाज पक्षाचं दर्शन साधारणपणे कधी होईल, याचं भाकित आठ-आठ दिवस आधी वर्तवलं जायचं. उत्तरायण आणि दक्षिणायनाचे परमोच्चबिंदू (turning points) साधारणपणे कोणत्या दिवशी येतील, हे घरात पंचांग येण्याआधीच सांगितलं जायचं.

अशी ती माणसं. हुशार आणि चतुर!

️️️️️©  सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आशिया खंडातली सर्वात मोठी लायब्ररी ☆ सुलू साबणे – जोशी ☆

? इंद्रधनुष्य ? 

☆ आशिया खंडातली सर्वात मोठी लायब्ररी ☆ सुलू साबणे – जोशी

 राजस्थान हे तेथील अनेक गोष्टी, विशेषत: तेथील वैभवशाली इतिहास, भव्य राजवाडे, राजे, महाराजे, महाराण्या यांच्या कथा, रंगेल संस्कृती आणि चविष्ट पाककृती यांमुळे प्रसिद्ध आहे.

पण कुणाला माहीत आहे का की, राजस्थानमधील थरच्या वाळवंटाखाली एक रहस्य दडले आहे? ते म्हणजे १६ फूट खाली एक भव्य दिव्य लायब्ररी आहे, जिथे १२ महिने २४ तास थंड वातावरण असते, अगदी उन्हाळ्यात सुध्दा..!

ही लायब्ररी आशिया खंडातील सर्वात मोठी लायब्ररी म्हणून गणली जाते, जिच्यात ९ लाखांपेक्षा जास्त पुस्तके आहेत..!

राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यामधल्या पोकरण तालुक्यात असलेल्या भादरिया गावात एका मंदिराखाली ही लायब्ररी बांधलेली आहे, जिच्यात एका वेळी ४००० माणसे (वाचक) बसू शकतात.

त्या ठिकाणी, ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र, महाकाव्ये, इतिहास, शब्दकोश, नकाशांसंबंधी, अशी अनेक पुस्तके ५६२ काचेच्या कपाटांमध्ये मांडलेली आहेत…

 

संग्राहिका : सुलू साबणे – जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “संगीत” – जोतिष्यशास्त्रातील एक उपाय ☆ संग्राहक – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ? 

संगीत— जोतिष्यशास्त्रातील एक उपाय ☆ संग्राहक – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

जोतिष्यशास्त्रात ग्रहांच्या स्पंदनाला खूप महत्व आहे. Viabrations ज्याला आपण मराठीत कंप किंवा स्पंदन म्हणू . जेव्हा एका सेकंदात सोळापेक्षा जास्त पण आठ हजारपेक्षा कमी स्पंदने होतात तेव्हा त्यातून नाद निर्माण होतो आणि जेव्हा तो लयबद्ध होतो तेव्हा त्याला आपण संगीत म्हणतो. सामवेद हा सर्वस्वी संगीतासाठी म्हणून प्रसिद्ध आहे. आणि जोतिष्य हे वेदांग आहे. या दोघांच्या संबंधाचा उपयोग करून आपण जोतिष्यशास्त्रात संगीताचा वापर एक उपाय म्हणून कसा वापरता येईल ते पाहू.          

संगीत हे एक असे एकमेवाव्दितीय विज्ञान आहे की  ज्याच्या प्रभावापासून कोणीही, अगदी पक्षी, प्राणी, मानव, आदिवासी, जात, धर्म, पंथ दूर नाहीत. संगीताला विज्ञानाचे विज्ञान असे म्हणतात कारण संगीत मग ते कोणत्याही देशाचे, भाषेचे असो त्याच्यामध्ये तुमच्या अंतरात्म्याला थेट स्पर्श करण्याची ताकद आहे. आणि ते समजण्यास कोणत्याही भाषेच्या भाषान्तराची गरज नसते.    

संगीताचे विज्ञान “नाद” यावर अवलंबून आहे आणि नाद हा साऱ्या विश्वात व्यापून राहिला आहे. “सा रे ग म प ध नि” हे सात सूर महादेवाच्या नृत्य आविष्कारातून निर्माण झाले असे मानतात.  स्वर व त्यांचे ग्रह खालील प्रमाणे-  

१) सा –रवी 

२) प … चंद्र 

३) ध — मंगळ 

४) रे —बुध  

५) नी — गुरु 

६) म –शुक्र 

७) ग –शनी 

तसेच राग आणि राशी   

१) भैरवी कुंभ 

२) भूप राग कन्या 

३) राग बैरागी मीन रास 

४) श्री राग वृषभ 

५) राग वसंत सिंह रास 

६) राग सारंग धनु 

७) राग पंचम धनु

भैरवी रागावर शनीचे  प्रभुत्व आहे असे मानतात. राग भैरवी हा एक गूढ, भव्य, दिव्य, धीर, गंभीर असा राग आहे त्यामुळे शनीचे सर्व गुण त्याला लागू पडतात. श्री राग हा हळुवार प्रेम, संध्याकाळची हुरहूर, कोमलता व्यक्त करताना वापरतात म्हणूच हा शुक्राचा राग असे मानतात. 

वेगवेगळे राग आणि त्यांची गायन पद्धती इतकी प्रभावशाली आहे की ऐकणाऱ्याचा मनाचा नूर आणि मूड बदलून टाकण्याची क्षमता आहे. ज्या जातकांच्या पत्रिकेत चंद्र शनी, मंगळ राहू युती असते ते थोडयाशा चिथावणीने एकदम सटकून जातात किंवा निराशेच्या गर्तेत लोटले जातात. अश्यांना वीणेच्या एका झंकारानें आपोआप शांत करता येते. उष्णता, प्रकाश, आवाज, चुंबकीय व विद्युत क्षेत्रात सौम्य व उग्र अशी दोन टोके असतात.  तसेच राग, लोभ, मद, मोह, मत्सर, शांति या स्थितीमध्ये दोन टोकाची स्थिती घातकच असते.  सुवर्णमध्य संगीतानेच साधणे शक्य आहे. 

जेव्हा चंद्राबरोबर शनी, मंगळ किंवा राहू असतात तेव्हा जातकात असलेली टोकाची नकारात्मक वृत्ती काही निवडक ट्यूनमुळे काढून टाकता येते. म्हणून तर आपल्या कडे विशिष्ठ मंत्र होम-जप असतात त्याच्या मध्ये संगीत आहेच. मंत्र होम जप या मधील नादानेच यजमानाच्या मनातील नकारात्मक वृत्तीवर परिणाम साधायचा असतो. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा काढून टाकून सकारात्मक व उत्तम विचारशक्ती वाढीस लागते. गुरु हा बुद्धीचा तर शुक्र हा भावनेचा कारक मानतात.  ज्यांच्या चतुर्थात शुक्र ते संगीत उत्तम जाणतात, तर गुरु असता ते संगीताचे उत्तम ज्ञान असलेले असतात.  

एके काळी भारतीयांना या संगीत आणि नाद यावर इतके प्रभुत्व होते की ते दीप राग आळवून दिवे तर मेघमल्हार गाऊन पाऊस पाडू शकत. तानसेन यांनी एकदा आपल्या संगीताने पिसाळलेला हत्ती शांत केला अशा कथा तुम्ही ऐकल्या असतीलच. पंचमहाभूतांवर विजय मिळवू शकण्याची ही कला कालांतराने भारतीयांची दैवीशक्ती व अंतर्स्फूर्तीबद्दलची होत गेलेली उदासीनता कारणीभूत आहे. त्यागराज, तानसेन, पंडित ओंकारनाथ ठाकूर, दिगंबर विष्णू पलुस्कर यांना त्यांच्या मनाच्या उत्कट भावावस्थेत  रागाची रचना सुचली असावी. असो.  पण आजही एक छानसे अंगाई गीत म्हणताच बाळ झोपी जाते की नाही. 

सप्तमात बिघडलेला शुक्र असणाऱ्यांनी मादक विषयासक्त संगीत फार ऐकू नये.  तसे करणे घातक ठरू शकते तसेच चतुर्थात बाधित शनी किंवा व्दितीयात शुक्र मंगळ अशा लोकांनी जरूर भक्तीसंगीत (डिव्होशनल) ऐकावे. 

सध्याचे संगीत हे ऐकणाऱ्यांना हिंस्त्र, पाशवी, रागीट, वाईट वृत्ती वाढीस लागण्यास मदत करते. पण संगीत हे एक दैवी शास्त्र आहे.  त्याचा आपण योग्य वापर समाज समृद्ध करण्यास केला पाहिजे.

(सदर लेख हा प्रसिद्ध जोतिषी बी. व्ही. रमण यांनी लिहिलेल्या Astrological मॅगझीनच्या (मार्च १९४४) संपादकीय लेखाचा सरळ अनुवाद आहे.)

संग्राहक –  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares