मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १६ — दैवासुरसम्पद्विभागयोगः— (श्लोक ११ ते २३) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १६ — दैवासुरसम्पद्विभागयोगः— (श्लोक ११ ते २३) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

चिन्तामपरिमेयां च प्रलयान्तामुपाश्रिताः । 

कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः ॥ ११ ॥

*

चिंता अपरिमित जन्मभराची ओझे वाहत जगती

विषयभोग आनंद श्रेष्ठतम मानुनि जीवन जगती ॥११॥

*

आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः । 

ईहन्ते कामभोगार्थमन्यायेनार्थसञ्चयान्‌ ॥ १२ ॥

*

पाशांनी आशांच्या बद्ध बाधा कामक्रोधाची

अर्थसंग्रह करित अन्याये तृष्णा विषयभोगाची ॥१२॥

*

इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम्‌ । 

इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम्‌ ॥ १३ ॥

*

प्राप्त जाहले जे मजला करण्या मनोरथ पूर्ती

धनी मी विपुल धनाचा होईल पुनरपि धनप्राप्ती ॥१३॥

*

असौ मया हतः शत्रुर्हनिष्ये चापरानपि । 

ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान्सुखी ॥ १४ ॥

*

वधिले शत्रूंना मी माझ्या आणखीनही वधेन मी

सिद्धीप्राप्त ईश्वर भोक्ता बलदंड मी सदा सुखी मी ॥१४॥

*

आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया । 

यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः ॥ १५ ॥ 

*

अनेकचित्तविभ्रान्ता मोहजालसमावृताः । 

प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेऽशुचौ ॥ १६ ॥

*

धनवान मी कुलवान मी मजसम ना येथे कोणी

यज्ञ करूनी दाना देइन जीवन जगेन आनंदानी

मोहाच्या या जाळ्यात अडकले अज्ञानाने भ्रांतचित्ती

कामाच्या भोगात गुंतुती महाऽपवित्र नरकात गती ॥१५, १६॥

*

आत्मसम्भाविताः स्तब्धा धनमानमदान्विताः । 

यजन्ते नामयज्ञैस्ते दम्भेनाविधिपूर्वकम्‌ ॥ १७ ॥

*

धनमान मदाने होउनी गर्विष्ठ उन्मत्त

पाखंडी शास्त्रविधीहीन यज्ञासी करतात ॥१७॥

*

अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः । 

मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः ॥ १८ ॥

*

अहंकार बल दर्प कामना संतापाने ग्रस्त

परनिंदेच्या आनंदात दंग होउनी स्वस्थ

देहस्थ आपुल्या इतरांच्या माझी ना जाण

सदैव माझा द्वेष करती धनञ्जया तू जाण ॥१८॥ 

*

तानहं द्विषतः क्रूरान्संसारेषु नराधमान्‌ । 

क्षिपाम्यजस्रमशुभानासुरीष्वेव योनिषु ॥ १९ ॥

*

क्रूर द्वेषी त्या पाप्यांना कृपा माझी ना लाभे 

माझ्याकरवी संसारीं त्यां योनी आसुरी लाभे ॥१९॥ 

*

आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि । 

मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम्‌ ॥ २० ॥

*

ऐशा मूढा मी न प्राप्त हो जन्मोजन्मांतरी

प्रतिजन्मी त्यां जन्म लाभतो योनी आसूरी 

सदैव त्यांना अधःपात होउनिया नीचगती

घोर नरक त्यांच्या वाटे जाणी रे तनयकुंती ॥२०॥ 

*

त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः । 

कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्‌ ॥ २१ ॥

*

काम-क्रोध-लोभाची त्रिविध द्वारे नरकाला

नाश करूनी अधोगतीला नेती आत्म्याला

प्राप्त करण्यासी सद्गती विवेक जागवुनी

त्याग करा या तिन्ही गुणांचा सद्गुण जोपासुनी ॥२१॥

*

एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः । 

आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम्‌ ॥ २२ ॥

*

नरक कवाडे मुक्त जाहला कल्याणाच्या आचरणे

प्राप्त तयासी परम गती ममस्वरूपी विलीन होणे ॥२२॥

*

यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः । 

न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम्‌ ॥ २३ ॥

*

स्वैर जयांचे असे आचरण शास्त्रविधी त्यागुनी

सुखही नाही सिद्धी नाही परमगती ना कोठुनी ॥२३॥

*

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसंपद्विभागयोगो नाम षोडशोऽध्यायः ॥१६॥

*

ॐ श्रीमद्भगवद्गीताउपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादरूपी दैवासुरसंपद्विभागयोग नामे निशिकान्त भावानुवादित षोडशोऽध्याय संपूर्ण ॥१६॥

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ यो मां पश्यति सर्वत्र। ☆ श्री हेरंब देऊळकर ☆

श्री हेरंब देऊळकर

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ यो मां पश्यति सर्वत्र। ☆ श्री हेरंब देऊळकर ☆

यो मां पश्यति सर्वत्र l

सर्वं च मयि पश्यति ll

…. श्रीमद्भगवद्गीतेमधल्या श्लोकाचा अर्धा चरण.

सिद्धावस्था प्राप्त झालेल्याची स्थिति या चरणात भगवंतांनी सांगितली. अखिल चराचराशी एकरुपता, अभिन्नत्व, ऐक्याचे म्हणा, वर्णन यात आले.

देवाचे नि प्रसन्नपणे l 

जे जे घडेल बोलणे l 

ते ते अत्यंत श्लाघ्यवाणे l 

या नांव प्रासादिक ll

….. अशा ज्या संतांनी प्रत्यक्ष परमेश्वराशी संवाद साधला व ज्यांनी प्रासादिक वाणीने आपल्यासारख्यांच्या आत्यंतिक हितासाठी (श्रेयस् ) कमीत कमी व सोप्या शब्दात जो उपदेश केला तो आपल्यापुढे ठेवावा म्हणून हा लेखनप्रपंच.

अवघी भूते साम्या आली l 

देखिली म्यां कै होती l

विश्वास तो खरा मग l 

पांडुरंग-कृपेचा ll

*

माझी कोणी न धरू शंका l 

ऐसे हो कां निर्द्वंद्व l 

तुका म्हणे जे जे भेटे l 

ते ते वाटे मी ऐसे ll

…… सर्व भूते एकरूप आहेत असे माझ्या डोळ्यांना जेंव्हा दिसेल, तेंव्हाच माझ्यावर पांडुरंगाची कृपा झाली असे मी समजेन. माझ्याविषयी कोणालाही जरासुद्धा शंका, भय वाटू नये अशी द्वंद्वरहित स्थिती झाली पाहिजे. आपल्या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात जी जी वस्तू दिसेल ती ती माझेच रूप आहे असे वाटले पाहिजे. समर्थ हेच सांगतात…..

कदा ओळखीमाजी दुजे दिसेना l

मनी मानसी द्वैत कांही वसेना l 

बहुता दिसा आपुली भेटी झाली l

विदेहीपणे सर्व काया निमाली ll

एकदा तुकाराम महाराज ज्ञानोबांच्या दर्शनासाठी जात असताना वाटेत शेतात झाडाखाली पक्षी दाणे टिपत होते. महाराजांना पाहून सर्व पक्षी उडाले. तुकारामांना वाईट वाटले, त्यावेळी त्यांच्या मुखातून हा अभंग निघाला. जो पर्यंत पक्षी पुन्हा अंगावर येऊन बसत नाहीत तोपर्यंत महाराज प्राणायाम करून निश्चल उभे राहिले. शेवटी महाराजांचा प्रेमभाव, विश्वात्मक भाव प्रकट झाला.. म्हणजेच किंबहुना चराचर आपणचि झाला असे झाले हे ओळखून सर्व पक्षी पुन्हा खांद्यावर बसले व झाडावर नि:शंक होऊन जसे खेळतात तसे खेळू लागले, तेंव्हा महाराजांचे समाधान झाले.

संत एकनाथ यांचे गाढवाला पाणी पाजणे, संत नामदेवांचे कुत्र्याने चपातीची चवड नेली असता त्यांच्या मागोमाग तुपाची तामली घेऊन धावत जाणे हा समदर्शी भाव झाला. गाढव, कुत्रा आपण म्हणतो, त्यांना त्यांतील चैतन्य दिसले. माऊलींनी निर्जीव भिंत चालवणे, ध्रुवाने प्राणायाम केल्यावर विश्वाचा श्वास थांबणे, कृष्ण गाई- वासरांना रानात नेत असताना वाटेत काटे-कुटे दगड धोंडे टोचत असता त्याचे दु:ख गोपीना होणे … हे सर्व चराचरात्मक भाव जागृत झाल्याचे द्योतक आहे. भगवद्गीता हेच प्रतिपादन करते…

विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनी l 

शुनि चैव श्वपाके च पण्डिता: समदर्शिन: ll

सिद्धावस्था अजूनही प्राप्त न झालेल्या साधकाचे मनोरथ सांगून थांबतो……

गंगातीरे हिमगिरीशिला बद्धपद्मासनस्य

ब्रह्मज्ञानाभ्यसनविधिना योगनिद्रां गतस्य l 

किं तैर्भाग्यं मम सुदिवसै: यत्र ते निर्विशंका:

कण्डूयन्ते जरठ हरिणा श्रुंगमंके मदीये ll

….. गंगेच्या तीरी हिमालयाच्या सान्निध्यात बसून पद्मासन इ. आसने सिद्ध करून घेतली, ब्रह्मज्ञानाचा अभ्यास करता करता योगनिद्रा प्राप्त झाली. पण माझ्या जीवनात तो सुदिन केंव्हा येईल जेव्हा हिमालयातील हरिणे निर्भय होउन आलेली खाज कमी करण्यासाठी आपली शिंगे माझ्या मांडीवर घासतील …. तो मंगलदिन.

© श्री हेरंब देऊळकर

बेळगाव 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ फ्लाइंग ऑफिसर निर्मलजित सिंह सेखों – मूळ हिन्दी व इंग्रजी लेखक : अनामिक ☆ मराठी अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

? इंद्रधनुष्य ?

☆ फ्लाइंग ऑफिसर निर्मलजित सिंह सेखों – मूळ हिन्दी व इंग्रजी लेखक : अनामिक ☆ मराठी अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे

फ्लाइंग ऑफिसर निर्मलजित सिंह सेखों.

परमवीर चक्र…. भारतीय हवाई दल.

निर्मलजित सिंह सेखों यांचा जन्म १७ जुलै १९४३ रोजी पंजाब मधील लुधीयाना जिल्ह्यातील रुरका इसेवाल या गावात सेखों जाट सिख परिवारात झाला होता. त्यांचे वडिल वारंट ऑफीसर (ऑनररी फ्लाइट लेफ्टिनेंट) त्रिलोक सिंह सेखों हेही भारतीय हवाई दलात नोकरीस होते व आई हरबंस कौर या गृहिणी होत्या.

४ जून १९६७ रोजी निर्मलजित सिंह सेखों हे भारतीय हवाई दलात पायलट म्हणून अधिकारी पदावर नियुक्त झाले.

१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात ते भारतीय वायुसेनेच्या “द फ्लाइंग बुलेट” या अठराव्या स्क्वाड्रन मध्ये कार्यरत होते.

१४ डिसेंबर १९७१ रोजी श्रीनगर विमानतळावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानी हवाई दलाच्या एफ-86 जेट विमानांनी 26वे स्क्वाड्रन पीएएफ बेस पेशावर येथून उड्डाण केले.

सुरक्षा तुकड़ी चे नेतृत्व सांभाळत फ्लाइंग ऑफिसर निर्मलजित सिंह तेथे १८व्या नेट स्क्वाड्रन वर तैनात होते.

भारतीय हवाई दल स्थानकावर हल्ला होताच निर्मलजित सिंह सेखों आपल्या विमानासह तयार झाले. तोपर्यंत फ्लाईट लेफ्टनंट घुम्मन ही कंबर कसून तयार झाले होते. थंडीचे दिवस असल्याने अगदी पहाटे च्या वेळी विमानतळावर खूपच धुके होते. त्यामुळे सर्वत्र अंधुक दिसत होते.

सकाळी आठ वाजून दोन मिनिटांनी चेतावनी मिळाली की शत्रूने आक्रमण केले आहे. निर्मलजितसिंह व घुम्मन यांनी लगेच आपण उडण्यास तयार असल्याचे सांगितले आणि उत्तराची दहा सेकंद वाट बघून मग विमानाचे उड्डाण करण्याचा निर्णय घेतला. बरोबर आठ वाजून ४ मिनिटांनी दोन्ही अधिकारी शत्रूचा सामना करण्यासाठी आपापल्या विमानांसह आकाशात होते.

त्यावेळी शत्रूचे पहिले F-86 सायबर जेट भारतीय विमानतळाभोवती चक्कर मारण्याच्या तयारीत होते. धावपट्टीवरुन घुम्मन यांच्या विमानाने उड्डाण केले होते. त्यानंतर निर्मलजित सिंह च्या नेट विमानाने उड्डाण करताच धावपट्टीवर त्यांच्या बरोबर मागे एक बाॅम्ब येऊन पडला.

घुम्मन स्वतः त्यावेळी एका सायबर जेट चा पाठलाग करत होते. निर्मलजित हवेत उडताच दोन सेबर जेट विमानांना सामोरे गेले. यापैकीच एका विमानाने विमानतळावर बाॅम्ब टाकला होता. बाॅम्ब पडल्यामुळे सेखों व घुम्मन यांचा विमानतळावरील संपर्क कक्षाशी संपर्क तुटला होता. बाॅम्ब च्या स्फोटामुळे संपूर्ण विमानतळ धूर व धुळीने व्याप्त झाले होते त्यामुळे दूरपर्यंत काहीच दिसत नव्हते. तेव्हड्यात फ्लाइट कमांडर स्क्वाड्रन लिडर पठानिया यांच्या नजरेत शत्रूची दोन विमाने हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे दिसले. घुम्मन यांनी ही निर्मलजीत सिंह यांच्या मदतीस जाण्यासाठी तेथे पोहोचण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही. तेवढ्यात रेडियो संदेशावर निर्मलजीत सिंह यांचा आवाज़ ऐकू आला… “मी दोन सेबर जेट विमानांच्या मागावर आहे. मी त्यांना परत जाऊ देणार नाही…. “

त्यांनंतर काही क्षणांत नेट च्या हल्याचा आवाज़ आकाशात ऐकू आला आणि आगीने पेटलेले एक सायबर जेट जमीनीवर पडतांना दिसले. तेव्हड्यात निर्मलजीत सिंह सेखों यांनी आपला संदेश पाठविला… “मी लढत आहे व मला खूप मजा येत आहे. माझ्या आजूबाजूला शत्रूंची दोन सेबर जेट आहेत. मी एकाचा पाठलाग करत आहे. दुसरे माझ्या बाजूनेच उडत आहे. “

या संदेशाच्या उत्तरात स्क्वाड्रन लिडर पठानिया यांनी निर्मलजित सिंह यांना सुरक्षेसंबंधी काही सुचना दिल्या. त्यानंतर नेट विमानातून अजून एक राॅकेट उडाले. त्याबरोबरच शत्रूचे सेबर जेट उध्वस्त झाल्याचा आवाज ही आला. त्यांनी अजून एक निशाणा साधला आणि जोरात आवाज करत शत्रू चे अजून एक सेबर जेट ध्वस्त झाले.

थोड्या शांततेनंतर फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंह सेखों यांचा संदेश पुन्हा ऐकायला आला. ते म्हणाले… “बहुतेक माझे नेट ही शत्रूच्या निशाण्यावर आले आहे. घुम्मन, आता तुम्ही मोर्चा सांभाळा. “

हा निर्मलजीत सिंह यांचा शेवटचा संदेश होता आणि देशाच्या रक्षणार्थ शत्रूच्या विमानांना धूळ चारत वयाच्या सव्विसाव्या वर्षी त्यांना वीरगती प्राप्त झाली.

फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंह सेखों यांच्या या अतुलनीय शौर्य व साहसामुळे आणि देशरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान दिल्याने भारत सरकार ने वर्ष १९७२ मध्ये युद्धकाळातील सर्वोच्च सन्मानाचे पदक, ‘परमवीर चक्र’ (मरणोपरांत) देउन त्यांचा सन्मान केला.

देशाला त्यांच्यावर गर्व आहे.

— — — — — हे वीर जवान, तुझे सलाम! ! ! ! !  🇮🇳

हिंदी व इंग्रजी लेखक- अनामिक

मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रांगोळी आणि मेंदूचा विकास…  लेखिका : डॉ. ईशा खासनीस☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? इंद्रधनुष्य ?

रघुनायका, मागणे हेचि आता☆ श्री अनिल वामोरकर ☆

 

 ५ ) इंद्रधनुष्य — 

 “ रांगोळी आणि मेंदूचा विकास “

 लेखिका : डॉ. ईशा खासनीस

 प्रस्तुती : अनिल वामोरकर 

बुचकळ्यात पडलात ना.. रांगोळी आणि मेंदुचा विकास ह्यांचा दूरदूरपर्यंत तरी काही संबंध असू शकेल का ? एक फक्त डेकोरेशनचा विषय आणि दुसरा चक्क न्यूरोलॅाजी सारखे क्लिष्टसायन्स — पटत नाहीये ? 

एक सांगू का ? सनातन हा धर्म नसून एक विशिष्ट जीवन प्रणाली, एक विचार प्रणाली आहे. आणि आपल्याला लावून दिलेल्या ह्या सगळ्या गोष्टींमागे खूप गर्भित अर्थ आहे. शास्त्र आहे. मेंदूचा विकास होताना त्यातील दोन न्यूरॉन्स मधील कनेक्शन्स तयार होऊन विकास होत असतो. जितके जास्त हे मज्जातंतूचे जाळे तीव्र व गुंतागुंतीचे होत जाईल तितका जास्त मेंदूचा विकास होत जातो. ज्याला interneuronal connections असे म्हणतात. पण हे conncections वाढतात कुठल्या कुठल्या गोष्टीने ? तर जितका मेंदू तुमचा ऍक्टिव्हली एंगेज राहील. म्हणजे TV, mobile, screen, reels बघताना तुमचा मेंदू passively एंगेज असतो. ज्याने मेंदूचा विकास तर सोडाच पण मेंदू थकतो. परंतु जितके लहान मुल वेगवेगळ्या परिस्थितींना expose होईल तितके हे neuronal connections वाढत जातात आणि मेंदूचा विकास होत जातो.

—- पण मग जसे जसे वय वाढत जाते तसे तसे age related brain atrophy नावाचा प्रकार सुरु होतो. म्हणजे वृद्धापकाळामुळे मेंदू सुकणे किंवा आकार कमी होणे. त्यामुळे विसरायला होणे, गोंधळ वाढणे, आत्मविश्वास कमी होणे, काहि काळापुरते एकदम सगळं ब्लँक वाटू लागणे अशा समस्या उद्भवतात. हे होऊ नये असे वाटत असेल तर मेंदूला चालना देणारे काम सतत करत राहिले पाहिजे नाहीतर स्मृतिनाश झपाट्याने सुरू होतो.

 

आता ह्या सगळ्याशी रांगोळीचा संबंध काय ? खरे तर ज्याने कुणी ह्या पारंपरिक रांगोळीचा शोध लावला तो मोठा सायंटिस्ट म्हणावा लागेल. (अर्थात आपले ऋषी मुनी हे सायंटिस्टच होते आजच्या परिभाषेत सांगायचे तर ) 

 

पारंपरिक रांगोळ्या बघा – ठिपक्यांच्या, कासव, षट्कोनी, त्रिकोणी, ठिपके वाढवत जाणे कमी करत जाणे, दक्षिणेकडे तर कोलम प्रकारातल्या कठीण रांगोळ्या,             ज्ञानकमळासारख्या क्लिष्ट रांगोळ्या.

१. जेव्हा ते ठिपके, त्या रचना काढायला तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला एकाग्रता लागते, 

२. तसेच ते विशिष्ट प्रकारे कसे काढावे ह्यास आकलन शक्ती लागते,

३. कुठून कुठे ठिपके जोडावे ? ह्यात ते लक्षात ठेवणे – ह्यास स्मरण शक्ती लागते.

४. रंगसंगती, वेगळ्यावेगळ्या रचना कशा तयार करता येतील यास कल्पनाशक्ती लागते.

म्हणजेच एकाग्रता, स्मरणशक्ती, आकलनशक्ती, कल्पकता वाढीस लागणे हे सगळे होणे म्हणजे तुमच्या CEREBRUM (मोठ्या मेंदूचा ) विकास होय 

ठिपके सरळ रेषेत काढणे, रेष बारीक आणि सरळ काढणे ह्या सगळ्यात तुमचे motor skills तयार होतात हे म्हणजे तुमच्या छोट्या मेंदूचा (cerebellum ) चा विकास होय.

आणि ह्या सगळ्याचे प्रशिक्षण लहानपणापासून मुलांना घरातूनच मिळावे म्हणून घरासमोर रोज आईने रांगोळी काढण्याची प्रथा.. त्यात मुलाचा विकास आणि ह्या सवयीने नंतरही अगदी उतार वयातही मेंदूला चालना कायम मिळत राहणार. म्हणजे अल्झायमर सारख्या स्मृतिभ्रंशाच्या आजाराला निमंत्रण नाही.

दाक्षिणात्य कोलम आणि ज्ञानकमळासारख्या रांगोळ्या तुम्ही खरंच काढून बघा, “it’s a brain game ” हे जाणवेल तुम्हाला. मी नुकतंच माझ्या मुलीला ज्ञानकमलाची रांगोळी शिकवली ती म्हणाली “आई हे खूप challenging आहे आणि interesting सुद्धा. अर्थात लहान असल्याने तिला एकदा शिकवताच लगेच काढता आली. परंतु ही रांगोळी परंपरा खूप शास्त्रीय आहे आणि brainstorming सुद्धा हे मात्र खरे. माझ्या एका अमेरिकन डॅाक्टर मित्राने एकदा मला विचारले कि “This your rangoli art is very beautiful but why to waste so much so colour and material daily and also the daily hard work of making designs & rubbing it next day? Instead, why don’t you make the paintings which are permanent. ” I replied,”Dr. Eric, as You are a doctor, you are a science person, you can definitely understand it, it’s not waste, it’s investment in your brain health ” हे ऐकल्यावर त्यानी खूप आश्चर्याने विचारले “But how? ” मग अर्थातच पुढचे स्पष्टीकरण ऐकल्यानंतर त्यांना ते मनोमन पटले “It’s amazing then”!

लेखिका : डॉ. इशा खासनीस, MD 

बंगलोर

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लखलखता हिरा.. अर्जुन देशपांडे – लेखिका : सुश्री मुक्ता आंग्रे ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ लखलखता हिरा.. अर्जुन देशपांडे – लेखिका : सुश्री मुक्ता आंग्रे ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

एक सोळा वर्षाचा मुलगा मेडिकलच्या दुकानात जातो. तिथे एक आजोबा कॅन्सरसाठीची औषधे घेत असतात. खरंतर त्यांना ती महागडी औषधे परवडत नसतात पण त्यांच्या पत्नीला कॅन्सर झालेला असल्याने ते कशीबशी पैशांची सोय करून औषधे घ्यायला आलेले असतात. तो मुलगा हे सगळे पहात असतो आणि न राहवून तो आजोबांना त्यांच्याबद्दल विचारतो. सत्य कळल्यावर तो खूप विचारात पडतो की असे हजारो, लाखो लोक या देशात आहेत की त्यांना ही महागडी औषधे परवडत नाहीत. पण तरीही काहीच पर्याय नसल्याने ते इतकी महाग औषधे खरेदी करतात. तो मुलगा आता यावर पर्यायांचा विचार करायला लागतो. यातूनच त्याच्या भावी उद्योगाचा पाया रचला जातो.

हा मुलगा म्हणजे ठाण्यातील वय वर्ष फक्त २२ असलेला ‘अर्जुन देशपांडे’ जो जगातील सर्वात तरुण उद्योजक आहे. त्याने स्थापन केलेल्या ‘जेनेरिक आधार’ या कंपनीचा टर्नओव्हर आहे मात्र पंधराशे कोटी रुपये !

१६ वर्षाच्या अगदी कोवळ्या वयात अर्जुनने ‘जेनेरिक आधार’ कंपनी स्थापन केली. कंपनीचा मूळ उद्देश हाच होता की गरजू आणि गरीब लोकांना अतिशय स्वस्तात औषधे उपलब्ध व्हावीत. त्यासाठी त्यांनी औषधे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना गाठले. तेथून स्वस्तात औषधे खरेदी करून ‘जेनेरिक आधार’ नामक मेडिकलच्या दुकानातून त्याची विक्री सुरू केली. जी औषधे उत्पादकांकडून विकत घेऊन मोठ्या मोठ्या फार्मा कंपन्या स्वतःचे लेबल लावून अतिशय महाग विकतात तीच औषधे जेनेरिक आधार मध्ये अतिशय स्वस्त दरात मिळतात. मध्ये कुठलेही दलाल आणि इतर खर्च नसल्याने ते ही औषधे इतक्या कमी किमती विकू शकतात.

आजच्या घडीला देशभरात ‘जेनेरिक आधार’ ची तीन हजार मेडिकलची दुकाने आहेत. जिथून औषधे खरेदी करून लोकांचे हजारो लाखो रुपये वाचत आहेत.

तसेच अर्जुनने आज दहा हजार पेक्षा जास्त लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे रोजगार देऊ केला आहे.

त्याच्या या कर्तुत्वाची दखल रतन टाटा सारख्या दिग्गज व्यक्तीनेही घेतली. रतन टाटांनी त्याला भेटायला बोलवून केवळ प्रोत्साहनच नाही तर त्याच्या कंपनीमध्ये गुंतवणूकही केली. याचे कारण सांगताना अर्जुन सांगतो कि आपल्या देशातील अगदी दुर्गम खेड्यातही औषधे उपलब्ध व्हावीत अशी अर्जुनप्रमाणे रतन टाटांचीही इच्छा आहे. आज पर्यंत अर्जुनला अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. वय वर्षे केवळ २२ असलेल्या अर्जुनला आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली तसेच जपान सारख्या अतिप्रगत देशात मानाने बोलवले जाते. त्याचे व्याख्यान ऐकायला लोक गर्दी करतात. जपानने तर त्याला अतिशय स्वस्त दरात मोठे कर्ज दिले आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी तसेच आपल्या देशाच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांनीही अर्जुनला भेटायला बोलवून त्याची प्रशंसा केली. द्रौपदी मुर्मुशी तर त्याचे आता आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे.

सध्याच्या चंगळवादी तरुणाई मध्ये अर्जुन देशपांडे हा एखाद्या लखलखत्या हिऱ्यासारखा चमकतो आहे. ज्याला आपल्या देशाचा अतिशय अभिमान आहे. त्याला आपल्या भारत देशाला अमेरिका अथवा इंग्लंड न बनवता अभिमानास्पद भारतच बनवायचा आहे.

अशा या लखलखत्या हि-याला, अर्जुनला मानाचा मुजरा !

लेखिका : सुश्री मुक्ता आंग्रे

प्रस्तुती : सुश्री स्नेहलता गाडगीळ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ क्विक हील – Quick Heal… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ क्विक हील – Quick Heal… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री. कैलास काटकर

दहावीनंतर शाळा सोडलेल्या मराठी मुलानं दोन हजार कोटींची QUICK HEAL आयटी कंपनी उभी केली.

नाव कैलास काटकर. गाव मूळचे सातारा जिल्ह्यातलं रहिमतपूर. राहायला पुण्याच्या शिवाजीनगर मधल्या नरवीर तानाजीवाडी मध्ये. वडील फिलिप्स कंपनीमध्ये हेल्पर, आई घरकाम करणारी. एक लहान भाऊ आणि एक बहिण. असं हे पाच जणांचं कुटुंब नतावाडीतल्या एका छोट्याशा खोलीत राहायचं.

कैलाश सगळ्यात थोरला. त्यामुळे सगळ्यांच्या अपेक्षा त्याच्याकडूनच. घरची परिस्थिती कशीही असली तरी त्याला शाळेत घातलेलं. पुस्तकं घ्यायला पैसे नाहीत, फी भरायला पैसे नाहीत. कसंबसं रडतखडत दहावी पर्यंत पोहचला. पण दहावीनंतर पुस्तकी शिक्षणाला रामराम ठोकला आणि खऱ्या शिक्षणाला सुरवात केली. आयुष्य शिकवत असलेलं व्यावहारिक शिक्षण.

तसं कैलासला लहानपणापासूनच घरातल्या बिघडलेल्या वस्तू सोबत खटपट करायची आवड होती. वडिलांचं बघून बघून सहावीमध्ये असतानाच रेडियो दुरुस्त करायला सुरवात केली होती. त्याबद्दलचा एक महिन्याचा कोर्ससुद्धा केला होता. काही तरी करू असा आत्मविश्वास होता. दहावीच्या निकालाची वाट न बघता नोकरी शोधायला सुरवात केली.

एक दिवस त्याला पेपर मध्ये एक जाहिरात दिसली. एका कंपनीमध्ये कॅलक्युलेटर दुरुस्त करणाऱ्याची आवश्यकता होती. कैलासने आयुष्यात कधी कॅलक्युलेटर बघितला सुद्धा नव्हता. तरी त्याने अप्लाय केले. नशिबाने मुलाखतीसाठी आलेल्या पंचवीस जणांमधून त्याची निवड झाली. अंगभूत खटपटेपणा कामी आला. त्या कंपनीत कॅलक्युलेटर दुरुस्तीचं काम तर शिकलाच, शिवाय बँकांमधल लेजर पोस्टिंग मशीन, फॅसेट मशिन, अशा वेगवेगळ्या मशिनरी दुरुस्त करायला यायला लागल्या.

किती जरी झालं तर खटपट्या माणूस नोकरीत किती दिवस शांत बसेल? नोकरी सोडली आणि मंगळवार पेठेत स्वतःचं दुरूस्तीचं दुकानं सुरु केलं. सोबत एक हरकाम्या मुलगा सुद्धा ठेवला. त्यांची दिवसभर वेगवेगळ्या मशीन सोबत झटापट चालायची. पैसे बऱ्यापैकी मिळू लागले. 

एक दिवस कैलासला एका बँकेत एक नवीनच मशीन दिसलं. त्याने चौकशी केली, कोणी तरी सांगितलं, ”याला कॉम्प्युटर म्हणतात. आता येणार युग कॉम्प्यूटरचं असणार आहे.”

कैलास विचारात पडला. येणारं युग जर कॉम्प्युटरचं आहे तर आपल्याला शिकून घेतलं पाहिजे. पण शिकायचं कुठे हा सुद्धा प्रश्न होता.

नव्वदच्या दशकातला तो काळ. कॉम्प्यूटरने नुकताच भारतात चंचू प्रवेश केला होता. त्याच्या येण्यानं आपल्या नोकऱ्या जातील म्हणून डाव्या-उजव्या संघटना एकत्र लढा देत होत्या. कॉम्प्यूटर प्रचंड महाग होते आणि फक्त मोठ्या ऑर्गनायझेशनमध्येचं दिसायचे. कैलाशला कोणी कॉम्प्यूटरच्या जवळ देखील येऊ देत नव्हत.

एकदा चान्स मिळाला. पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रोडवर टाईम्स ऑफ इंडियाचं ऑफिस आहे. त्यांचे तीन प्रिंटर बंद पडले होते. दुरुस्तीला आलेल्यांनी सांगितलं ते फेकुनच द्यायच्या लायकीचे उरले आहेत. ऑफिसवाल्यांनी तशीच तयारी केली होती. पण योगायोगाने कैलाश तिथे आले होते. त्यांनी पैजेवर ते मशीन दीड तासात दुरुस्त करून दाखवले. 

टाईम्स ऑफ इंडियानं फक्त प्रिंटरचं नाही तर कैलाशच्या हातात आपले कॉम्प्यूटरसुद्धा देऊन टाकले. दोन वर्षाचा दुरुस्तीचा करार केला. कैलाशच्या आयुष्यातला तो टर्निंग पॉइंट ठरला. टाईम्स ऑफ इंडियाचं बघून बाकीच्या कंपन्या, बँकादेखील त्यांना काम देऊ लागल्या. पुण्यात कॉम्प्यूटर हार्डवेअर दुरुस्तीमध्ये कैलाश काटकर हे नाव प्रसिद्ध झालं.

स्वतःचं शिक्षण अर्धवट सुटलं पण कैलाश यांनी आपल्या भावाबहिणीच्या शिक्षणाच्या बाबतीत कोणतीच तडजोड केली नाही. धाकटा भाऊ संजयसुद्धा हुशार होता. त्याला त्यांनी मॉडर्न कॉलेजमध्ये कॉम्प्यूटर इंजिनियरिंगला प्रवेश घ्यायला लावला. तो देखील दिवसभर कॉलेज करून संध्याकाळी भावाच्या कामात मदत करत होता.

त्याकाळी व्हायरस हे प्रकरण नव्यानेचं उदयास आले होते. साथीच्या रोगाने जसे माणसे आजारी पडतात त्याप्रमाणेच कॉम्प्यूटरदेखील एखाद्या विशिष्ट प्रोग्रॅमचा प्रादुर्भाव झाला तर आजारी पडतात. मग ते आजारी पडू नयेत यासाठी असत रोगप्रतिबंधकारक औषधं. यालाच म्हणतात अँटी व्हायरस.

या व्हायरसच्या साथीची लागण झालेले बरेच कॉम्प्यूटर पुण्यात दुरुस्तीला कैलाश यांच्याच दुकानांत यायचे. लोक सांगायचे की तुम्हीच याला दुरुस्त करा. पण हा विषय होता सॉफ्टवेअरचा. हार्डवेअर वाले त्यात काय करणार. काहीतरी करून कैलाश ते कॉम्प्यूटर सुरु करून द्यायचे. त्यांच्या धाकट्या भावाने, संजयने सारख्या सारख्या लागण होणाऱ्या व्हायरसवर उपाय म्हणून एक टूल बनवले होते. जे त्यांच्या कस्टमरला खूप आवडले.

त्याचवेळी कैलास काटकर यांच्या बिझनेस माइंडमध्ये आयडिया आली की हा अँटी व्हायरसचा धंदा बराच पैसा कमावणार. त्यांनी भावाला एक स्पेशल कॉम्प्यूटर घेऊन दिला. नतावाडीमधल्या त्या वस्तीतल्या एका खोलीच्या घरात संजय काटकर अँटी व्हायरस बनवायच्या मागे लागला. दीड वर्षे लागली पण मराठी माणसाच स्वतःचं अँटी व्हायरस तयार झालं. त्याला नाव देण्यात आलं.क्विक हील.

वर्ष होतं १९९५. संजयनी स्वतःच या अँटी व्हायरसचा लोगो डिझाईन केला, पॅकेजिंग तयार केलं. कैलास काटकर कंपन्यांच्या दारोदारी फिरून आपलं प्रोडक्ट खपवू लागले. कॉम्प्यूटरमधल्या डाटाची नासाडी करणाऱ्या व्हायरसवर उतारा असलेला अँटी व्हायरस असणं किती गरजेचे आहे हे पटवून सांगेपर्यंत त्यांना नाकी नऊ यायचे पण त्यांनी जिद्द सोडली नाही.

त्याकाळात पुण्यात बऱ्याच आयटी कंपन्या सुरु होत होत्या. आयटी पार्क उभं राहत होतं. अशा सगळ्या नव्या जुन्या कंपन्यांना परदेशी अँटी व्हायरस पेक्षा चांगलं आणि स्वस्त असलेलं हे देशी अँटी व्हायरस पसंतीस पडलं. क्विकहिल अँटी व्हायरस बरोबर अनेक कंपन्यांनी वर्षाचे करार केले.

अजून मोबाईल फोन देखिल आले नव्हते. अशा काळात आफ्टर सर्विसला देखील भरपूर महत्व होतं. कैलाश काटकर यांनी मेहनतीने आपले ग्राहक सांभाळले. पुण्याबरोबर नाशिक, मुंबई येथे देखील आपली टीम उभी केली. वेगवेगळ्या शहरात जाण्याचाही त्यांना फायदा झाला. 

क्वालिटीच्या जीवावर स्पर्धेच्याकाळातही क्विकहिल मोठी झाली. मंगळवर पेठेत असणाऱ्या ऑफिसमधून कधी एक लाख स्क्वेअर फुट च्या ऑफिसमध्ये रुपांतर झाले कळले देखील नाही.

आज क्विकहिल हे भारतीय आहे, पुण्यात तयार झालंय, यावर कोण विश्वास ठेवणार नाही. तिथं तेराशेच्या वर कर्मचारी काम करतात. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही त्यांचे ऑफिसेस उघडलेले आहेत. आज ऐंशीहून अधिक देशातल्या कॉम्प्यूटरमध्ये हे देशी अँटी व्हायरस बसवलेलं दिसेल. 

…. आणि हे सगळं साम्राज्य उभं केलंय, दहावीनंतर शाळा सोडलेल्या एका मराठी मुलानं.

विशेष माहिती : हा उद्योजक मराठी माध्यमातून शिकला होता. हे आजकालच्या पालकांनी लक्षात घ्यावे.

लेखक – अनामिक.

प्रस्तुती : मेघ:श्याम सोनावणे . 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “अ लॉंग वे फ्रॉम होम…” लेखक : श्री श्रीनिवास बेलसरे ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ “अ लॉंग वे फ्रॉम होम…” लेखक : श्री श्रीनिवास बेलसरे ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

ते १९८०चे दशक होते. तेंव्हाही तरुण पिढीवर पाश्चिमात्य संगीताचा प्रभाव होताच. उलट तो नव्यानेच पडू लागलेला असल्याने संख्येने थोड्या लोकांवर असला तरी फार खोलवर उमटत होता. त्यातच निग्रो लोकांचा (हो, तेंव्हा ‘निग्रो’ हा शब्द निषिद्ध नव्हता!) एक संगीत ग्रुप होता- बोनी ‘एम’ ! त्या चार जणाच्या ग्रुपने एके काळी जगभर धूम करून टाकली होती. अगदी ताजेतवाने संगीत, मनाला भुरळ घालणारे सूर आणि त्यावेळच्या संथ नाचांना सोयीचा ठरणारा ठेका असलेली ही गाणी फार लोकप्रिय झाली होती. शिवाय गाण्याच्या संथ गतीमुळे त्यातील कविता समजणेही सोपे जाई. आणि खरे सांगायचे तर फॅशनला कसले आलेय लॉजिक? तेंव्हा ही गाणी अचानक फॅशनमध्ये आली होती, बस्स ! ‘आमचे’ आहे, ‘आमच्या पिढीचे’ आहे म्हणूनच ते मस्त आहे, अशी हट्टी श्रद्धा कशाबद्दलही बाळगू शकणारे ते निरागस वय ! त्यात या ग्रुपच्या गाण्यांनी आम्हाला चांगलेच पकडले होते. बोनी’एम’ची सगळीच गाणी खूप लोकप्रिय होत गेली. चटकन लक्षात येण्यासाठी ‘डॅडी, डॅडी कुल’ हे गाणे आठवले तरी पुरे ! तोच बोनी ’एम’ ग्रुप ! जगभर त्यांच्या लॉंगप्ले तबकड्या मिळू लागल्या.

घरात लॉंग प्ले रेकॉर्ड प्लेयर असणे हे खानदानी श्रीमंतीचे लक्षण समजले जाई. ज्यांच्याकडे तो नव्हता त्यांच्यासाठी हॉटेलमध्ये अशा तबकड्या लावल्या जात आणि फक्त कपावर कप चहा पीत बसलो तरी मुंबई पुण्यातील इराणी हॉटेल्स आणि इतरत्र गावाबाहेरची धाबेवजा हॉटेल्स मुलांना कितीही वेळ अशी गाणी, गझला, अगदी ‘शोले’ आणि ‘दिवार’चे डायलॉग्ज ऐकत बसू देत. तिथेच तरुणाईच्या सगळ्या ‘कहाण्या’ घडत. त्या हळव्या कहाण्यांच्या पुढच्या एपिसोडची ‘स्क्रिप्ट’ कधीकधी अगदी जवळच्या मित्र-मैत्रीणीत सामुहिकपणे सुद्धा लिहिली जाई. नंतर अगदी आतून हुरहूर लावणारे क्षण कधीकधी डोळ्यासमोर घडत तर कधी घडून गेलेल्या हुरहूर लावणा-या क्षणाची श्राद्धेही साजरी होत असत. असो, अजून काही काही घडत राही…!

बोनी ’एम’ ग्रुपच्या एका गाण्याने मला खूप खोल आणि खूप हळवी जखम करून ठेवली होती. अजूनही अनेकदा ‘युट्युब’वर हे गाणे ऐकून मी जुन्या ‘दाग’ चित्रपटातील तलत महेमूदने गायलेल्या गाण्याप्रमाणे ‘जख्म फिर से हरा’ करून घेतो. लीझ मिशेलने गायलेल्या या गाण्यात फक्त चार-पाच ओळीच होत्या. पण त्यांचा आशय मात्र अमेरिकेतील निग्रो लोकांचे काही शतकांचे दु:ख पोटात सामावण्याइतका सखोल होता.

“समटाईम्स आय फील,

लाईक अ मदरलेस चाईल्ड”

हे धृवपद गाण्यात वारंवार येई आणि लीझ मिशेलच्या को-या, धारदार पण मुग्धमधुर आवाजात ‘ऑन्ट दिनाज सॉंग’चे ते करूण शब्द काळीज चिरत जात. ‘कधीकधी मला आपण आई नसलेले मुल आहोत असे वाटते’ हे भाषांतर त्या कवितेतली आर्तता मराठीत आणूच शकत नव्हते. या गाण्यातली वेदना ‘सख्या रे घायाळ मी हरिणी’ मधली होती. तिचे भाषांतर शक्यच नव्हते. अलीकडे सहज या गाण्याबद्दल पुन्हा वाचले आणि मन अनेकदा भरून आले. अमेरिकेत हे गाणे पहिल्यांदा १४७ वर्षांपूर्वी म्हणजे १८७० साली गायले गेले. ते गाणा-या ग्रुपचे नाव होते ‘फिस्क जुबिली सिंगर्स. ’ पुढे या ‘ऑन्ट दिनाज सॉंग’च्या अनेक आवृत्या निघाल्या. मूळ कवितेतही बरेच बदल झाले, पण कृष्णवर्णीयांच्या गुलामीच्या वेदनातील तीव्रता त्यातून नेहमीच व्यक्त होत राहिली.

तब्बल २४५ वर्षे अमेरिकेसारख्या देशात माणसांची खरेदीविक्री जनावरांप्रमाणे केली जाई हे आज कुणाला खरेही वाटणार नाही. त्यावेळी निग्रोंची विक्री करताना जर एखादी निग्रो बाई लेकुरवाळी असेल तर गुलाम विकत घेणारा गोरा माणूस कधी फक्त काळे मुलच खरेदी करी. मग त्या मुलाला आईच्या कडेवरून खेचून काढले जाई आणि नव्या मालकाच्या स्वाधीन केले जाई. कोवळे लुसलुशीत मास खायला चटावलेल्या खाटीकाने गाईपासून तिचे पाडस ओढून काढावे तसे ! मग आफ्रिकेतील जंगलातून आणलेले ते काळे घाबरलेले रडणारे मूल गुलामांनी गच्च भरलेल्या जहाजातून श्रीमंत अमेरिकन जमीनदाराच्या शेतात आणले जाई. तिथे त्याच्यातून दिवसरात्र काम करणारा गुलाम घडविला जाई. खरे तर एक मूक पशूच. कारण त्याला मालकाची भाषा येत नसे. त्याची भाषा बोलणारे कुणी आसपास नसे. थोडी चूक झाली तर चामड्याच्या चाबकाचा कळवळून टाकणारा फटका ! संपले त्याचे माणूस म्हणून असलेले जीवन ! त्याच्या आफ्रिकेतील कुटुंबाची आणि त्याची परत कधीही भेट होऊ शकत नसे. मरेपर्यंत आपल्या गरीब काळ्या आईचे रडवेले डोळे आठवत, तिच्या वत्सल स्पर्शासाठी तडफडणारे ते मूल आयुष्यभर झुरत राही आणि जनावरांसारखे काबाडकष्ट करताना एक्कलकोंडे आयुष्य कंठून एक दिवस मरून जाई.

निग्रोंच्या या सार्वत्रिक सत्यकथेवर हे गाणे बेतलेले होते. त्यातील शब्द होते,

‘समटाईम्स आय फील

लाईक अ मदरलेस चाईल्ड,

अ लॉंग, लॉंग वे,

वे फ्रॉम माय होम.’

ध्रुवपदापाठोपाठ हे शब्द वारंवार येत तेंव्हा आमच्यापैकी प्रत्येकाच्या मनाच्या पडद्यावर त्या काळ्या निग्रो आईच्या हातातून तिचे मूल ओढून काढणारे क्रूर गोरे शिपाई दिसत राहत, तिचा मूक आक्रोश जणू आम्हाला ऐकू येत असे. आमचे भाबडे डोळे ओलावत. नंतर मग उगाच आमचे गाव, गावाकडचे कायमचे सुटलेले घर, मागे राहून गेलेले बालपण, देवाघरी गेलेले आईवडील, नोकरीसाठी सुटलेला देश, असे काही काही आठवत राही. त्यात लीझ मिशेलचे काळजात धारदार पाते घुसविणारे शब्द पुन्हा कानावर येत…

‘नो वे, नो, नो, नो वे, टू गेट होम.’… आता घर पुन्हा कधीच दिसणार नाही ही जीवघेणी जाणीव लीझ हृदयाला छिद्र पाडून आत खुपसते आहे असेच वाटे. अस्वस्थ करणारा अनुभव होता तो ! आशाताईनी गायलेले –

‘जिवलगा, राहिले दूर घर माझे,

पाउल थकले, माथ्यावरचे

जड झाले ओझे’

… हे जसे अगदी खोल आत शिरून अस्वस्थ करत राहते तसे या गाण्याने होई.

वय वाढते तसे हळूहळू माणूस आतूनही राठ होत जातो. आपण हळवे नाही असे मानणे आणि विशेषत: तसे दाखविणे मर्दपणाचे किंवा परिपक्वपणाचे लक्षण मानले जाऊ लागते. आपण दुस-याच्या दु:खाने अस्वस्थ होणे, त्याच्या वेदनेने आपल्याला रडू येणे, दुर्बलपणाचे मानू लागतो. निबरपणाच्या प्रवासात नंतर त्याहीपुढे जावून स्वत:च्या दु:खानेही डोळ्यात पाण्याचा थेंब न येऊ देणे हे मोठेपणाचे लक्षण मानले जाऊ लागते. हे असे आतले माणूसपण सुकविणे, डोळ्यातून थेंबच सांडू नयेत म्हणून मनातली 

‘ रिलेटिव्ह ह्युमिडीटी ’ संपविणे म्हणजे समर्थ होणे ठरू लागले आहे.

खरे तर साता समुद्रापलीकडे – अमेरिकेत ज्यांचे आई -वडील शतकांपूर्वी गुलामीचे जिणे जगले त्यांचे अडीचशे-तीनशे वर्षापूर्वीचे दु:ख आठवून स्वत: अस्वस्थ होणे हा आपल्या माणूसपणाचा पुरावा असतो. संत पौलाने म्हटलेले माणसाच्या आत असणारे ‘देवाचे घर’ शाबूत असल्याची ती खूण असते. जर काहीतरी सिद्ध करण्याच्या भरात ती वेदना जाणवत नसेल तर आपण देवाच्या घरापासून किती दूर आलोय, नाही? कदाचित आता घरी परत जाणे कधीच शक्य नाही !

“अ लॉंग वे….

नो, नो, नो वे 

टू गेट होम !’…

*******

लेखक : श्री श्रीनिवास बेलसरे

 72086 33003

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १६ — दैवासुरसम्पद्विभागयोगः— (श्लोक १ ते १0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १६ — दैवासुरसम्पद्विभागयोगः— (श्लोक १ ते १0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः । 

दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्‌ ॥ १ ॥

*

जया ठायी नाही भय अंतर्यामी जो निर्मलीन

योगी निरंतर दृढ आर्जवे स्वाध्याय तपाचरण ॥१॥ 

*

अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनम्‌ । 

दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम्‌ ॥ २ ॥

*

अहिंसा सत्य अक्रोध त्याग शांती अक्रूरता 

करुणा अलोलुपता गात्रविवेक लज्जा मृदुता ॥२॥

*

तेजः क्षमा धृतिः शौचमद्रोहो नातिमानिता । 

भवन्ति सम्पदं दैवीमभिजातस्य भारत ॥ ३ ॥

*

क्षमा तेज धैर्य अद्रोह निराभिमान नीतिमानता

लक्षणे ही जन्मजात दैवसंपन्नाची जाण भारता ॥३॥

*

दम्भो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च । 

अज्ञानं चाभिजातस्य पार्थ सम्पदमासुरीम्‌ ॥ ४ ॥

*

गर्व दंभ  अहंकार क्रोध कठोरता तथा अज्ञान

लक्षणे ही संपत्ती ही आसुरी पुरुषाची अर्जुन  ॥४॥

*

दैवी सम्पद्विमोक्षाय निबन्धायासुरी मता । 

मा शुचः सम्पदं दैवीमभिजातोऽसि पाण्डव ॥ ५ ॥

*

देवी संपदा मुक्तीदायक आसुरी होत बंधन

तव संपदा दैवी रे न करी शोक पंडुनंदन ॥५॥

*

द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिनदैव आसुर एव च । 

दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु ॥ ६ ॥

*

दैवी अथवा आसुरी केवळ मनुजाची प्रवृत्ती

कथिली दैवी तुजसी ऐक राक्षसी प्रकृती ॥६॥

*

प्रवृत्तिं च निवृत्तिं च जना न विदुरासुराः । 

न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते ॥ ७ ॥

*

राक्षसी मनुजा नाही विवेक प्रवृत्ती निवृत्ती

सदाचरण ना सत्य ठावे अंतर्बाह्य ना शुद्धी ॥७॥

*

असत्यमप्रतिष्ठं ते जगदाहुरनीश्वरम्‌ । 

अपरस्परसम्भूतं किमन्यत्कामहैतुकम्‌ ॥ ८ ॥

*

जगदोत्पत्तीसी ईश्वर कारण  सर्वथैव असत्य

नर-मादी संभोग या जगताचे हेचि असे सत्य

जगरहाटी राहण्या अखंड काम हाचि कारण

दुजे सारे मिथ्या वदती आसुरी वृत्ती मनुजगण ॥८॥

*

एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः । 

प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतोऽहिताः ॥ ९ ॥

*

मिथ्या ज्ञानाचा अवलंब मंद जयांची मती

अपकारी हे क्रूरकर्मी जगक्षय कारण होती ॥९॥

*

काममाश्रित्य दुष्पूरं दम्भमानमदान्विताः । 

मोहाद्‌गृहीत्वासद्ग्राहान्प्रवर्तन्तेऽशुचिव्रताः ॥ १० ॥

*

गर्व दंभ अहंकार युक्त नर अतृप्त कामनाश्रित

भ्रष्ट आचरण अज्ञानी स्वीकारत मिथ्या सिद्धांत ॥१०॥

 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘जो प्राप्त है, पर्याप्त है.’ – लेखिका : सौ. रेखा जेगरकल ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘जो प्राप्त है, पर्याप्त है.‘ – लेखिका : सौ. रेखा जेगरकल ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

 

कधी कधी आपल्या आवडीच्या विषयावर लिहायची संधी मिळते तेंव्हा खूप सारे विषय फेर धरू लागतात. मला मात्र नेहमी एखाद्या वेगळ्या म्हणजे विषय देऊन त्यावर लिहिण्यापेक्षा आपल्या मनाला भावलेला विषय किंवा एखाद्या व्यक्तीचा आवडलेला पैलू, ज्यामुळे आपल्याला विचार करायला लावलं जातं त्याविषयी लिहायला आवडतं.

कौन बनेगा करोडपती हा बौद्धिक, मनोरंजनाचा कार्यक्रम मला अतिशय आवडतो. आपल्या बुद्धीत भर पडते. जेंव्हा जेंव्हा माझं उत्तर बरोबर येतं तेव्हा मला खूप आनंद होतो. परवाच्या भागात फास्टेस्ट फिंगर मध्ये अव्वल ठरलेले नीरज सक्सेना हाॅट सीटवर आले. एकदम शांत रीतीने बसले. किंचाळत, डान्स करत, रडत, हात उंचावत, अमिताभला जोरात मिठी मारत यातलं त्यांनी काहीही केलं नाही. ओळख सांगायची तर ते सायंटिस्ट आहेत. पीएचडी आहेत व कोलकत्यातील एका विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. अतिशय प्रसन्न, साधं व्यक्तिमत्त्व. डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलामांसोबत काम करायला मिळालं हे जीवनातील भाग्य ते समजतात. त्यांनी सांगितलं की प्रथम मी माझाच विचार करत होतो परंतु कलामांच्या सान्निध्यात राहून मी माझ्याबरोबर दुसऱ्यांचा व राष्ट्राचा विचार करू लागलो.

नीरजजी खेळू लागले. एकदा ऑडियन्स पोल घेतलं परंतु दुगुनास्त्रमुळे त्यांना ती लाईफ लाईन पुन्हा मिळाली. सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांनी सफाईदारपणे दिली. त्यांच्या बुद्धीमत्तेची चुणूक पाहून थक्क व्हायला झालं. तीन लाख वीस हजार जिंकून, बोनस तेवढीच रक्कम मिळविली मग ब्रेक झाला.

ब्रेकनंतर अमिताभ बोलू लागले… चलिए डाॅक्टरसाब अब आप के सामने आ रहा है ग्यारह वा प्रश्न… ए रहा प्रश्न… इतक्यात नीरजजी म्हणाले… सर मैं क्विट करना चाहता हूँ.. अमिताभ बच्चन यांना आश्चर्य वाटले. इतकं चांगलं खेळणारे, तीन लाईफ लाईन जीवित असताना. करोड रुपये सहज जिंकतील असं असताना खेळ सोडत आहेत का? विचारलं… आज तक ऐसा कभी हुआ नहीं..

नीरजजी शांतपणे म्हणाले… माझ्या शिवाय आणखी खेळाडू वाट पहात आहेत व ते माझ्या पेक्षा लहान आहेत. त्यांनाही संधी मिळाली पाहिजे तसं तर मला खूप पैसे मिळाले आहेत. मला वाटतं जो प्राप्त है पर्याप्त है. अधिक की आशा नहीं है.

अमिताभ बच्चन अवाक् झाले. सर्वत्र शांतता पसरली. एक सेकंद स्तब्धता होती. नंतर सर्वांनी खूप वेळ उभं राहून टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक केलं. अमिताभ म्हणाले… खूप काही शिकायला मिळालं. नतमस्तक व्हावे अशी व्यक्ती आज पहायला मिळाली.

खरं तर एवढी संधी समोर असताना केवळ दुसऱ्यांना संधी मिळावी व जे मिळालं तेवढं खूप आहे असा विचार करणारी पहिलीच व्यक्ती माझ्या पाहण्यात आली. मनातून मी त्यांना नमस्कार केला.

आज जगात केवळ पैसा कमविण्यासाठी माणूस धडपडत आहे. कितीही पैसा कमवला तरी समाधान नाही. हाव कमी होत नाही. कमीच पडतो. या पैशा मागे लागून घर, झोप, ननाती, प्रेम, मैत्री या साऱ्या गोष्टींना तो मुकत आहे. पैशाचा हव्यास संपत नाही. अशा वेळी डॉ. नीरज सक्सेना सारखी देव माणसं येतात व बोध देऊन जातात. या कलियुगात अशा समाधानी, अल्पसंतुष्ट माणसांचं दर्शन दुर्लभ झालेलं आहे.

त्यांनी खेळ सोडल्यानंतर एक मुलगी हाॅट सीट वर येऊन बोलू लागली… तीन मुली झाल्या म्हणून वडिलांनी आई सहित आम्हाला बाहेर काढलं. आम्ही एका आश्रमात राहतो…

मी विचार केला की नीरजजींनी खेळ सोडला नसता तर शेवटचा दिवस असल्याने कुणालाही संधी मिळाली नसती. आज त्यांच्या त्यागाने एक गरीब मुलीला चार पैसे मिळण्याची संधी प्राप्त झाली. जगात इस्टेटीतला एक पैसा सोडायची तयारी नसते. त्यासाठी भांडणे. खून खराबा होताना आपण पाहतो. स्वार्थ बोकाळलाय सर्वत्र. परंतु हे उदाहरण अपवाद आहे.

देव माणसात असतो. ते नीरजजी सारख्या दु ऱ्याचा, देशाचा विचार करणाऱ्या माणसात. मी आयुष्यात कधीच या थोर माणसाला विसरणार नाही. आज माझ्या आवडीच्या विषयावर म्हणजेच अनोख्या व्यक्तिमत्त्वाविषयी लिहायला मिळालं याचा आनंद आहे.

गरज भागली की माणसानं थांबावं व दुसऱ्यांना संधी द्यावी. स्वार्थाचा त्याग करावा. सर्व सुखी होतील. हा धडा शिकायला मिळाला. मला नेहमीच अशा. व्यक्तींविषयी आदर वाटतो व लिहावं वाटतं.

लेखिका : सौ. रेखा जेगरकल

दापोली.

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘टाटा‘ ही केवळ दोन अक्षरे नाहीत – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री जमशेटजी टाटा

? इंद्रधनुष्य ?

 टाटा‘ ही केवळ दोन अक्षरे नाहीत – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

मित्रांनो, आपण मुंबई पुणे रेल्वेने प्रवास करतांना खोपोली जवळ मोठमोठे पाइप खाली गेलेले बघतो, हे काय आहे त्यामागची कथा !!

नुसेरवान टाटा आपला मुलगा जमशेट व कुटुंबासह नवसारीहून व्यवसाय करण्याकरिता मुंबई येथे १८४७ साली आले. तेव्हां जमशेट ८ वर्षांचा होता. दूरदृष्टी हा टाटा घराण्याचा वारसाच, पुढे कशाची गरज पडेल, काय केले पाहीजे हे त्यांना फार आधीच कळते.

१९०२ च्या नोव्हेंबरमधे जमशेटजी टाटा लॉर्ड हँमिल्टन यांना वळवण वीज प्रकल्पाचा प्रस्ताव घेऊन भेटले. मुंबईची विजेची वाढती मागणी, गरज या सर्वाचा यांत विचार केला होता. परंतु या प्रस्तावास परवानगी मिळून काम चालू करण्यांस १९१० साल उजाडले. १९१० साली जमशेटजींनी २ कोटी रूपये भांडवल उभे करून फेब्रुवारी १९११ ला कामाला सुरवात केली. ७फूट व्यासाच्या पाइप मधून खंडाळा, लोणावळा येथे पडणारे तुफान पावसाचे पाणी १८०० फूट ऊंचीवरून खाली खोपोली येथे ७ पाइप लाइन टाकुन आणायचे, तेथे जनित्राद्वारे विज निर्माण करावयाची व ती मुंबईला पोहोचवायची अशी ही योजना होती. त्याकरता वळवण येथे दोन धरणे बांधून पाणीसाठा वाढवायचा की जेणेकरून वर्षभर विज निर्मिती चालु राहील.

१९११ मधे शुभारंभ झाल्यावर दुसऱ्याच दिवशी ७ हजार मजुर खंडाळा-लोणावळ्याच्या डोंगरदऱ्यांत रात्रंदिवस कामाला लागले. सरळ सुळके, गर्द झाडी यातुन पाइप वर चढवणे, उतरवणे, परत योग्य जागी जोडणे असे सर्व उच्च दर्जाचे काम चालु झाले. १९११ साली केलेल्या या कामांत आजही कोठे गळती नाही, की कोणताही पाइप फुटला नाही. प्रचंड वेगाने कित्येक वर्षे या पाइपातुन पाणी येत आहे व विज निर्मिती होत आहे. हे पाइप जर्मनीहून आणले होते, जनित्राची चक्रे स्वित्झर्लडहून आणली, जनित्र अमेरिकेहून, विज वाहुन नेणाऱ्या तारा इंग्लडहून आणल्या. हे सर्व टाटा कंपनीच्या लोकांनी ४ वर्षात पुर्ण केले. १९१५ मधे लॉर्ड विलींग्टन यांनी खोपोलीत कळ दाबल्यानंतर मुंबईच्या सिप्लेक्स गिरणीत दिवे लागले. १९११ साली दळणवळणाची साधने, उपजत टेक्नॉलॉजी, परिस्थिती, कम्युनिकेशनच्या सोयी या सर्वांचा विचार केला तर ह्या अफाट कामाची व दूरदृष्टीची टाटांची समज किती मोठी होती हे लक्षात येते.

टाटा, ही भारतीयांसाठी केवळ दोन अक्षरे नाहीत. संपत्ती निर्मिती हा टाटांचा उद्देश कधीच नव्हता उलट समाजाकडून आलेले पैसे समाजालाच परत करावयाचे हे त्यांचे धोरण होते.

देशवाद टाटांच्या रोमारोमात मुरलेला आहे. जे जे उदात्त, उत्तम आहे ते ते मी या देशासाठी घडवीन असा ध्येयवाद आहे. पैशाची उधळपट्टी नाही, भपका नाही, सवंग प्रसिद्धी नाही पण कर्तव्य आणी गुणवत्ता यात सर्वोच्च असण्याची उत्तुंग ध्येय आहेत. २६/११ च्या हल्ल्यानंतर त्यासाठी जबाबदार असणाऱ्या पाकिस्तानबरोबर त्यांनी व्यापार बंद केला. वाटेल ती किंमत देऊन टाटांच्या गाड्या खरेदी करण्यास आलेल्या पाकिस्तानी राजदूताला वाटाण्याच्या अक्षता दिल्या. आताही असहिष्णुतेच्या वादाचा केंद्रबिंदू असलेल्या त्यांचा ब्रँड अँबेसेडर असलेल्या आमिरखानला त्यांनी तडकाफडकी काढुन टाकले आहे. देशाभिमान व देशवाद ओतप्रोत भरलेल्या टाटांना या देशात मात्र सरकारकडुन स्वागत होत नाही कारण टाटा काम मिळण्यासाठी कोणताही भ्रष्टाचार करत नाहीत व गुणवत्ता तिळभरही कमी करण्यास नकार देतात!!

हिंदुस्तानातल्या कारखानदारीच्या या पितामहांना…

कोटी कोटी प्रणाम

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares