मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “’मर्रि कामय्या…” ☆ सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “मर्रि कामय्या…☆ सुश्री शोभा जोशी ☆

हे नाव अशा एका जनजातीतील व्यक्तिचं आहे, ज्याचं घर जाळलं गेलं, ज्याला जंगलात राहावं लागलं. त्याचंच घर नाही तर सबंध गावच जाळलं गेलं. त्याच्या मनाची काय अवस्था झाली असेल!असं आहे की सूर्याला तात्पुरतं ग्रहण लागलं म्हणून त्याचं तेज कमी होत नाही. तसंच कामय्यांचं झालं.

आंध्र प्रदेशातील, पाडेरू क्षेत्रातील, हुकूमपेट मंडलातील गरूडापल्ली गाव हे या वीराच्या नावाने ओळखले जाते. कामय्यांचा जन्म कोंडा दोरा जनजातीत झाला होता.

ब्रिटिशांच्या काळात, आपल्या देशातील काही सावकारांनी भोळ्या- भाभड्या वनवासींकडून जास्तीत जास्त कर वसूल केल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यांना पाणी, रस्ते, शिक्षण या प्राथमिक सुविधाही मिळत नव्हत्या. त्यांचं अगदी सरळ सरळ शोषण चालू होतं. हीच परिस्थिती गरूडापल्ली गावातही होती. या सावकारांना इंग्रजांचा पाठिंबा होता ही गोष्ट लपून राहिली नव्हती. या सावकारांच्या विरूध्द पर्यायाने इंग्रजांविरूध्द लढा उभा करण्याची योजना मर्रि कामय्यांनी ठरवली. आता सूर्याला लागलेलं ग्रहण सुटेल ही आशा लोकांच्या मनात जागृत झाली.

सिताराम राजूंनी १९२४ मध्ये केलेल्या रम्पा संग्रामापासून प्रेरणा घेऊन कामय्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यांनी ५० लोकांचं एक दल बनवून इंग्रजांविरूध्द संघर्ष सुरू केला.

ज्या ज्या गावात कोंडा जनजातीतील लोक राहात त्या त्या गावात ग्राम समित्या निर्माण करून शाळा सुरू केल्या. आज आपण जनजातीतील मुलांना शिक्षण मिळावे म्हणून आपण निरनिराळ्या प्रकारे प्रयत्न करत आहोत. दूर दूर वनात राहाणार्‍या मुलांना औपचारिक शिक्षणाबरोबरच अनौपचारिक शिक्षण मिळावे, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून संस्कार वर्ग, छात्रावास चालवत आहोत. असाच प्रयत्न त्याकाळी जनजातीतील लोकांनीही केला होता. त्यातलेच एक मर्रि कामय्या होते.

लोकांना स्वावलंबी बनवण्याचेही प्रयत्न चालू होते. हळू हळू लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ लागली. ही गोष्ट इंग्रजांच्या पचनी पडत नव्हती. त्यांनी कामय्यांविरूध्द कारवाई करण्यास सुरूवात केली. प्रथम त्यांनी गरूडापल्ली गाव जाळून खाक केले. कामय्या डगमगले नाहीत. त्यांनी आपल्या गावातील ३६० बेघर झालेल्या कुटुंबांना घेऊन एक बीटागरूदू नावाचे गाव वसवले. इंग्रजांनी तिथेही अत्याचार सुरू केले. कामय्यांच्या सगळ्या संपत्तीचा लिलाव केला. कामय्या काही काळ आपल्या साथीदारांबरोबर जंगलात भटकत राहिले. अशा परिस्थितीत ५० लोकांचं एक दल बनवून इंग्रजांविरूध्द संघर्ष सुरू केला. अर्थातच त्याचं नेतृत्व कामयांकडे आलं. इंग्रजांनी त्यांना कैद करून ११ दिवस तुरूंगात टाकले. या ११ दिवसात त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले.

कैदेतून मुक्त झाल्यावर, असहकार आंदोलनात सहभागी झाले, हा आरोप त्यांच्यावर ठेऊन त्यांना पुन्हा कैद केले. यावेळी कैदेतून मुक्त झाल्यावर ते भूमीगत झाले. त्यांनी आपले केंद्र वारंवार बदलून इंग्रजांशी लढा चालू ठेवला.

अशावेळी एक दुर्घटना घडली. त्यांची मुलगी नदी पार करत असताना त्यांच्या नजरेसमोर वाहून गेली. हा त्यांच्या मनावर झालेला खूप मोठा आघात होता. तरीही आंदोलनातून त्यांनी माघार घेतली नाही. व्यक्तिगत जीवनातील अनेक प्रकारचे कष्ट सहन करूनही ते इंग्रजांबरोबर संघर्ष करत राहिले. हा संघर्ष भारत स्वतंत्र होईपर्यंत चालू राहिला.

५ मे १९५९ ला त्यांनी अखेरचा श्र्वास घेतला. तुमच्याजवळ काहीच नसताना, तुमच्या मनात जनहिताची निर्माण झालेली ओढ यातूनच लोकांना तुमची ओळख पटते. आणि म्हणूनच कामय्यांचे नाव त्या भागात आदराने घेतले जाते. या जनजातीतील वीराला ५ मे या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन.

©  सुश्री शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आता मिळवायला नव्हे तर वाटायला शिकले पाहिजे… – लेखक : श्री आनंद प्रकाश देवतरसे ☆ प्रस्तुती – सुश्री कालिंदी नवाथे☆

? इंद्रधनुष्य ?

☆ आता मिळवायला नव्हे तर वाटायला शिकले पाहिजे… – लेखक : श्री आनंद प्रकाश देवतरसे ☆ प्रस्तुती – सुश्री कालिंदी नवाथे ☆

एकदा नाशिकला भागवत कथा झाली. सांगता झाली तेव्हा सर्वांना प्रसादही दिला गेला. सारी आवराआवर झाल्यावर एक वृध्द महिला आली. म्हणाली, ‘‘प्रसाद कधी मिळेल?”

सारे जिकडचे तिकडे झाल्याचे तिला कळल्यावर ती खट्टू झाली. तेवढ्यात त्या कार्यालयात असणारी एक महिला म्हणाली, ‘‘थांब मावशी. एक लाडू आहे. देते तुला!” वृध्देला आनंद झाला.

बुंदीचा लाडू हातात घेऊन तिने कपाळाला लावला आणि लाडवाचा एक तुकडा घेऊन उरलेला लाडू परत देत म्हणाली, ‘‘पुन्हा कुणी आलं तर यातला कणभर त्यालाही देता येईल. कुणी तसंच जायला नगं! परसाद जीव निवण्यासाठी पायजे… पोट भरण्यासाठी नाय्!”

मला तिचे पाय धरावे वाटले. आध्यात्मिकतेने अनासक्ती येते ती अशी! मन प्रसन्न असेल ना; तर मणाने नाही, कणानेही समानाधा लाभते हे त्या वृध्देच्या संवादातून उलगडले.

परमार्थ वेगळे काय शिकवतो? आयुष्यातला प्रत्येक क्षण भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारता आला तर सारे तणाव, सारा वैताग संपून जाईल. जगणे ‘प्रासादि’क होईल. बीजात सारा वृक्ष सामावलेला असतो, तसा कणा कणात ब्रह्मांडव्यापी आनंद कोंदटलेला असतो. पण आपल्या हव्यासापोटी आपण ब्रह्मांडच खिशात घालायचे म्हणतो. मग हट्ट सुरू होतो. आणखी मिळवेन, खूप मिळवेन, जास्तीत जास्त मिळवेन. शेवटी ओंजळ रिक्तच राहते. असे निराश होण्यासाठी आपल्याला आयुष्य मिळालेले नाही. खरे तर आयुष्य हाच महाप्रसाद आहे. एकदा ते मिळाले म्हणता ना, आणखी काय हवे? आता मिळवायला नव्हे तर वाटायला शिकले पाहिजे. तळहातावर मिळालेला गोपाळकाला, स्वत:साठी थोडा ठेवून कण कण सर्वांना वाटायचा असतो!

देता यायला लागले की आपणही कृष्ण होतो. परमार्थ म्हणजे जवळचे उत्तम सर्वांना देणे. थोड्यातलाही आनंद घेणे. आपले अश्रू रोखून हसण्याचे चांदणे पसरणे. बस्स, हव्यास आणि हट्ट सोडण्याची तयारी करायला पाहिजे.

लेखक : श्री आनंद प्रकाश देवतरसे 

संग्राहिका : सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘१ मे ची कहाणी…’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘१ मे ची कहाणी…’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

दरवर्षी १ मे हा दिवस आपण “ महाराष्ट्र दिन “ म्हणून उत्साहाने साजरा करतो. या महाराष्ट्र दिनाचा हा इतिहास जाणून घेऊ या.

या इतिहासाला काळी चौकट आहे ती हुतात्म्यांच्या रक्तलांछित बलिदानाची ! २१ नोव्हेंबर १९५६ या दिवशी मुंबईच्या फ्लोरा फाउंटनच्या आसपास तणाव जाणवत होता. कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिला होता. या अन्यायकारक निर्णयामुळे मराठी माणसाचा संताप शिगेला पोचला होता. सर्वदूर होणाऱ्या सभांमधून या निर्णयाचा जाहीर निषेध होत होता. याचा परिणाम म्हणजे मराठी अस्मिता जागी झाली. सरकारचा निषेध करण्यासाठी कामगारांचा एक विशाल मोर्चा फ्लोरा फाऊंटन समोरील चौकात येण्याचे नियोजन झाले. त्यानंतर मोठा जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून आणि दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून अत्यंत त्वेषाने घोषणा देत, फ्लोरा फाउंटनच्या ठिकाणी गोळा झाला. तो पांगवण्याकरता पोलिसांनी लाठीचार्ज केला. मात्र मोर्चेकरी बधले नाहीत. मग मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी पोलिसांना गोळीबार करण्याचा आदेश दिला. यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला झुकावे लागले आणि शेवटी १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. म्हणून १ मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.

या १०६ हुतात्म्यांनी जिथे बलिदान केले त्या फ्लोरा फाउंटनच्या चौकात १९६५ मध्ये हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली. आता तो ‘हुतात्मा चौक’ म्हणून ओळखला जातो. या आंदोलनात आचार्य अत्रे यांचे प्रत्यक्ष रित्या आणि त्यांच्या मराठा या दैनिकात छापल्या जाणाऱ्या ज्वलंत लेखांचे खूप मोठे योगदान आहे.

१ मे हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ म्हणूनही ओळखला जातो. ४ मे १८८६ मध्ये अमेरिकेतील कामगारांनी आठ तास काम करण्यास नकार दिला आणि आपल्या न्यायहक्कासाठी संप केला. शिकागोत अनेक कामगार ठार झाले. त्यानंतर १८८९ मध्ये या कामगारांच्या स्मरणार्थ १ मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्याची घोषणा समाजवादी संमेलनात करण्यात आली. म्हणूनच दरवर्षी जगभरात १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा 🌹🙏

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ प्रेरणापुंज ऋतुराज ॥ –  माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

सुश्री मीनल केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ प्रेरणापुंज ऋतुराज ॥ –  माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर

बिहारचा युवक ऋतुराज चौधरी ने परवा रात्री १:०५:०९ वाजता गुगल ला हादरवून सोडलं. त्याने ५१ सेकंदांपर्यन्त गुगल इंजिनच हॅक करून टाकलं. हॅक होताच अलम दुनियेत बसलेल्या गुगल अधिकाऱ्यांचे हातपाय थंडगार पडले. अमेरीकेच्या ऑफिसमधे एकच हल्लकल्लोळ माजला.

त्यांना नेमकं कारण कळण्यापुर्वीच म्हणजे ५१ सेकंदाने ऋतुराजने गुगल फ्री करून इंजिनची सेवा पुन्हा पुर्ववत सुरू केली आणि गुगल ला मेल करून कळवून दिले कि गुगलच्या नेमक्या कोणत्या चुकीमुळे तो ते हॅक करू शकला.

सदरहू ई मेल करून ऋतुराज झोपी गेला कारण आपल्या देशात रात्र होती. परंतू मेल वाचून अमेरीका मात्र बैचैन झाली. मेल मधे ऋतुराजने दिलेल्या सर्व तपशीलानुसार तिथल्या अधिकाऱ्यांनी सुध्दा १ सेकंदासाठी गुगल हॅक करून पाहिलं आणि त्यांना तांत्रिक उणिवेची खात्री पटली.

अमेरीकेत तडकाफडकी ह्या गंभीर विषयावर १२ तास मिटींग चालली आणि शेवटी निर्णय झाला की संबंधीत युवकाला बोलाविण्यात यावं.

दिवसा ठीक २ वाजता ऋतुराज ला मेल आला की ‘आम्ही तुझ्यातील गुणवत्तेला सॅल्यूट करत आहोत. कृपया तू आमच्यासोबत काम कर.

आमचे अधिकारी तुला न्यायला येत आहेत. ‘

लगेच दुसऱ्या मेल द्वारा गुगलने ऋतुराजला 

‘जॉईनींग लेटर ‘ दिले ज्यामधे ३. ६६ कोटी रूपयांचे पॅकेज आहे.

ऋतुराज जवळ पासपोर्ट नव्हता. गुगलने भारत सरकारशी विस्तृत चर्चा केली आणि केवळ दोन तासाच्या अवधीमधे त्याचा पासपोर्ट तयार करून त्याच्या घरी पोहोचता केला. ऋतुराज आता प्रायव्हेट जेट विमानाने अमेरिकेला रवाना होईल.

ऋतुराज हा आय आय टी मणिपूर येथील ‘बी टेक’ द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. आणि बेगुसराय शहराजवळ असलेल्या मुंगेरगंज नावाच्या खेड्याचा रहिवासी आहे.

जगाच्या सुपरपॉवरला भारी पडलेल्या भारतमातेच्या ह्या अद्भुत गुणवंत युवकाला सलाम. —–

माहिती संकलक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “शौर्य-श्रीमंत सैनिक” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

“शौर्य-श्रीमंत सैनिक ☆ श्री संभाजी बबन गायके 

डोईवर अक्षता पडल्या आणि अवघ्या पंचवीस-तीस दिवसांत कुंकू सीमेवर लढायला गेलं…. त्यावेळी ती सतरा वर्षांची असेल नसेल! त्यानंतर त्याला नऊ महिन्यांनीच पाहण्याचा योग आला! तिच्या यजमानांच्या नावाचा अर्थ चमकता तारा… अगदी चुनचुनीत मुलगा! वाढत्या वयासोबत या ता-याची चमक वाढतच होती.

इतरांचे धनी नोकरीवरून सुट्टीवर आले की, बायकोसाठी सोन्याचे दागिने आणत असत… हिचा नवरा मात्र पहिल्याच सुट्टीत चांदी घेऊन आला! पण ही चांदी हि-यापेक्षाही मौल्यवान आणि चमचमती. या चांदीच्या दागिन्याच्या एका बाजूला हाती बंदूक घेऊन ताठ उभा असलेला सैनिक दिसत होता तर दुस-या बाजूला बंदुकीची संगीन… टोकदार… आभाळाकडे उंचावलेली… शत्रूच्या नरडीचा वेध घेऊ पाहणारी. तो चांदीचा दागिना म्हणजे एक पदक होतं…. सेना मेडल म्हणतात याला. वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी हे पदक आपल्या छातीवर अभिमानाने मिरवण्याचे भाग्य लाभले होते तिच्या कुंकवाला….. होय… शिपाई चुन्नीलाल तिच्या घरधन्याचं नाव. जम्मू येथील रहिवासी. सहा मार्च १९६८ रोजी जन्मलेले चुन्नीलाल वयाच्या सोळाव्या वर्षी सेनेत भरती झाले दोन वर्षांच्या कठीण प्रशिक्षणापश्चात त्यांना 8, Jammu And Kashmir Light Infantry नेमणूक मिळाली. आणि पहिल्याच वर्षी म्हणजे १९८७ मध्ये त्यांना फार मोठ्या लष्करी कारवाईत सहभागी होण्याची सुवर्णसंधी लाभली…. होय… सैनिकासाठी लढाई करायला मिळणे म्हणजे एक सुवर्णसंधीच असते. पण या लढाईसाठी त्यांना काही महिन्यांचे खूप कठोर प्रशिक्षण घ्यावे लागले… कारण त्यांची नेमणूक होणार होती सियाचीनच्या पर्वतांचे रक्षण करण्यासाठी.

१९८७ हे वर्ष होते… पाकिस्तानी घुसखोर सेनेने हजारो फूट उंचीवर असलेले एक शिखर बेकायदा ताब्यात घेतले होते… आणि त्याला त्यांच्या कायद-ए-आजम (कायदेआजम) अर्थात मोहम्मद अली जिनाचं नावही देऊन टाकलं होतं! भारत-पाक-चीन या सीमा त्रिकोण भागात ही शत्रूची चौकी असणं म्हणजे भारतासाठी मोठाच धोका होता. शत्रूला तिथून हुसकावून लावण्याची नितांत गरज लक्षात घेऊन लढाऊ बाणा असलेले सैनिक या कामगिरीवर पाठवण्यात आले! ही कामगिरी जीवघेणी होती. प्रचंड अंगावर येणारे शिखर, थंडी, बर्फ आणि वरून पाकिस्तानी अचूक गोळीबार यांतून त्या चौकीपर्यंत पोहोचायचे होते…. नायब सुबेदार बाणासिंग स्वयंस्फूर्तीने या मोहिमेत सामील झाले… तसेच आपले तरुण वीर चुन्नीलाल सुद्धा… त्यांच्या सोबत तसेच नीडर इतरही काही जवान होतेच. बाणा सिंग साहेबांचे मार्गदर्शन होते…. चुन्नीलाल इंच इंच पर्वत चढत चढत अंधार, थंडी, बर्फ याची पर्वा न करता मोठ्या कौशल्याने त्या बर्फाळ पर्वतावर चढले…. यातील एक सुळका ४५७ मीटर्स उंचीचा आणि एकदम खडा म्हणजे जवळजवळ ९० अंशाचा होता… बर्फाचे वादळ सुरु होते… समोरचे नीट काही दिसत नव्हते…. पण तरीही चुन्नीलाल यांनी शत्रूच्या बंकरवर तुफान हल्ला चढवला…. सहका-यांना सोबत घेऊन त्या बंकरमधील सर्व पाकिस्तानी यमसदनी पोहोचवले…. त्यांना वाटलं ही भूताटकीच की काय? इतक्या उंचीवर असे कोणी येईल आणि हल्ला करेल हे त्यांनी स्वप्नातही पाहिले नसेल! या मोहिमेतील कामगिरी बद्दल त्यांचे म्होरके बाणा सिंग साहेबांना परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले! या मोहिमेला ‘राजीव’ असे नाव दिले गेले होते आणि ही मोहीम यशस्वी केल्याबद्दल या चौकीला बाणा सिंग यांचे नाव देण्यात आले! आणि चुन्नीलाल यांना याच मोहिमीतील यशस्वी सहभागासाठी त्यांच्या कारकीर्दीतील पहिले मोठे मेडल मिळाले होते…. सेना मेडल! ही तर फक्त सुरुवात होती…. पुढे १९९९ मध्ये त्यांनी पूंच सेक्टर मध्ये थोडेथोडके नव्हे तर १२ पाकिस्तानी घुसखोर ठार मारण्यात मोठी भूमिका बजावली! या मोहिमेत त्यांचे दुसरे पदक आले… वीर चक्र!.. पाच टोके असलेला तारा असतो या चांदीच्या चक्रावर! चुन्नीलाल नावाच्या ता-याच्या छातीवर हे दुसरे पदक मोठ्या डौलाने विराजमान झाले. एका साध्या सैनिकाने कमावलेली हे मोठी दौलत होती.

चुन्नीलाल पुढे आफ्रिकी देशात आपल्या भारतातर्फे संयुक्त राष्ट्र सैन्यातही कामगिरीवर गेले… त्यांच्या पलटणला तिथेही उत्तम शाबासकी प्राप्त झाली! 

२१ जून २००७… या दिवशी चुन्नीलाल हे नायब सुबेदार या पदावर पदोन्नत झाले…. सामान्य सैनिक म्हणून भरती झालेले सैनिक अंगभूत गुणांच्या जोरावर उच्च पदावर पोहोचू शकतात… त्यातलेच नायब सुबेदार हे पद. यांच्याकडे सैनिकांच्या एका तुकडीचे नेतृत्व दिले जाते… आणि इतर महत्त्वाची कामे तर असतातच! चुन्नीलाल यांना बढती मिळून केवळ तीनच दिवस उलटले होते. नायब सुबेदार साहेब कुपवाडा मधील एका सैन्य चौकीचे प्रमुख होते… उंची होती १४ हजार फूट. रात्र मोठी अंधारी होती…. आकाशात ढगांनी दाटी केलेली. दोन हातापलीकडचे काही दिसत नव्हते…. पारा वजा ५ इतका खाली गेलेला… जीवघेणी थंडी. पहाटेचे साडे तीन वाजलेले… चुन्नीलाल साहेब पहा-यावर मौजूद होते… त्यांना सीमेजवळ काही हालचाल जाणवली…. त्या स्थितीत ते स्वत: शोध घेण्यासाठी पुढे सरसावले. तेवढ्यात तेथून जोरदार गोळीबार झाला… चुन्नीलाल साहेबांनी आपल्या सहका-यांना सावध केले होतेच. प्रत्युत्तर तर दिले गेलेच… दोन अतिरेकी ठार मारले गेले! पण या गदारोळात आपले दोन सैनिक जखमी झाले… आणि जिथे अतिरेकी लपले होते नेमके त्याच्याजवळच कोसळले होते… लपलेल्या अतिरेक्याकडून या सैनिकांच्या जीवाला शंभर टक्के धोका होता… चुन्नीलाल साहेब निर्धाराने पुढे गेले… आणि त्या दोघांना ओढत सुरक्षित ठिकाणी आणून ठेवले… पण तिथे एक अतिरेकी लपून बसला होता आणि तिथून पळून जायच्या बेतात होता… चुन्नीलाल साहेबांनी त्याचा माग काढला… त्याच्यावर अगदी जवळून गोळीबार केला… आणि त्याला वर पाठवला! पण त्याची एक गोळी साहेबांच्या पोटात घुसली… प्रचंड रक्तस्राव सुरु झाला! 

रुग्णालयात पोहचेपर्यंत नायब सुबेदार चुन्नीलाल साहेब स्वर्गस्थ झाले होते… ही कामगिरी त्यांना त्यांचे तिसरे पदक देऊन गेली… अशोक चक्र! शांतता काळात सैनिकांना प्रदान केले जाणारे सर्वोच्च सैन्य पदक! 

नायब सुबेदार या तिस-या पदकाने आणखी श्रीमंत ठरले होते… तिन्ही महत्त्वाची, सन्मानाची पदके मिळवणारे एकमेव सैनिक ठरले चुन्नीलाल साहेब! त्यांच्या धर्मपत्नी चिन्तादेवी यांनी २६ जानेवारी २००८ रोजी आपल्या पतीचं हे पदक मोठ्या अभिमानाने स्वीकारले… चुन्नीलाल साहेबांनी एवढी मोठी श्रीमंती प्राप्त केली होती… जिचे मोल करणे अशक्य! चुन्नीलाल साहेब हे इतर सैनिकांसाठी आदर्श बनले आहेत! त्यांच्या अलौकिक जीवनावर आणि शौर्याबद्दल Bravest of the Brave : The Inspiring Story of Naib Subedar Chunni Lal, AC()अशोक चक्र), VrC, (वीर चक्र) SM(सेना मेडल) हे Lt General Satish Dua (Retd) यांनी लिहिलेले एक इंग्रजी पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. एका सैनिकाच्या कामगिरीची एका मोठ्या अधिका-याने घेतलेली ही नोंद अत्यंत अभिमानास्पद अशीच आहे.

जय हिंद.. जय भारत.. जय हिंद की सेना ! 

  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख २ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख २ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

|| श्री नारद उवाच || 

सात्वस्मिन्परमप्रेमरूपा ॥ २ ॥

सा – ती (भक्ती), अस्मिन् – या, प्रत्यक्ष नित्यअपरोक्ष परमात्म स्वरूपाचे ठिकाणी, परमप्रेमरूपा – म्हणजे परमप्रेम असणे हेच तिचे स्वरूप (अशी आहे).

वरील सूत्राचा अर्थ सोप्या शब्दात पुढील प्रमाणे सांगता येईल. भक्ति हे परमप्रेमरूप आहे. खरंतर इतका सुलभ अर्थ असताना याचे अधिक विवरण करण्याची गरज आहे? पटकन उत्तर नाही असेच येईल, पण गरज आहे हेच त्या प्रश्नांचे खरे उत्तर आहे.

या नश्वर जगातील प्रत्येक जण प्रेमाचा भुकेला आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. इतकेच नव्हे तर प्रत्येक जण कमीअधिक प्रमाणात दुसऱ्यांवर प्रेम करीत असतो, हे आपल्याला मान्य असेल…!

आणखी एक गोष्ट आपल्याला सर्वांना मान्य होण्या सारखी आहे ती म्हणजे सामान्य मनुष्य ज्याला प्रेम म्हणतो किंवा प्रेम करतो ते प्रेम नसते, तर स्वार्थापोटी केलेली कृति असते. एका गावात एक कुटुंब होते, त्या पती पत्नीचे एकमेकांवर निरतिशय प्रेम होते. दुर्दैवाने त्यातील पतीचे आकस्मिक निधन झाले. तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. लोकं अंत्ययात्रेला जमले. पत्नी कलेवर उचलू देईना. शेवटी गावातील म्हाताऱ्या बायकांनी तिची समजूत काढली आणि अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रा वेशीपर्यंत पोचते न पोचते तोच त्या स्त्रीचा आवाज लोकांना ऐकायला आला. ती म्हणाली, भाऊ, यांच्या करगोट्याला तिजोरीची चावी आहे, ती काढून द्या…

तर, सामान्य मनुष्य असे प्रेम करतो.

आपण आता खऱ्या प्रेमाचे खरे (सत्यकथा) उदाहरण पाहू.

एक मोठे कीर्तनकार होऊन गेले. आयुष्यभर त्यांनी पांडुरंगाची सेवा केली. वयोमानानुसार दोघांनाही वृद्धत्व आले. त्यांच्या शेवटच्या आजारपणात घरातील मंडळींनी असे ठरवले की महाराजांचे काही बरेवाईट झाले तर त्यांच्या पत्नीला लगेच सांगायचे नाही. त्यांना ते सहन होणार नाही….

एके दिवशी महाराजांनी प्राण सोडला. बातमी घरातील कर्त्याला सांगण्यात आली. घरावर दुःखाचा डोंगरच कोसळला…. ! पुरेशी काळजी घेऊनही ती बातमी कोणीतरी त्या माउलीला सांगितली. बातमी ऐकताच ती माउली म्हणाली की आगी, महाराज गेले !! मग मी इथे काय करते ? त्या माउलीने त्याक्षणी प्राण सोडला…. !

याला म्हणतात, “संपूर्ण समर्पण, परमप्रेम!!!”

मनुष्याचे खरे प्रेम कोणावर असते ? सांगा पाहू. कोणी म्हणेल, आईवर, कोणी म्हणेल बाबावर, कोणी काही कोणी काही सांगेल. सर्व उत्तरे कदाचित बरोबर असतील पण अचूक असतीलच असे म्हणता येणार नाही. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे, मनुष्य आपल्या देहावर सर्वात जास्त प्रेम करतो. देहाला जरा कष्ट झाले तरी मनुष्याचे चित्त विचलित होतं. मनुष्य 

दिवसभर देहाला सुख कसे लाभेल, यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असतो. (यातून त्याला किती सुख मिळते, हा प्रश्न न विचारलेला बरा…)

भगवतांनी एकट्याला करमेना, म्हणून हा पसारा निर्माण केला, पण तो सर्व व्यापून वेगळा राहिला. मनुष्य पण एकट्याला करमत नाही, म्हणून प्रपंच पसारा निर्माण करतो, पण मनुष्य मात्र त्या पसाऱ्यात गुरफटला जातो, इथेच त्याची फसगत होते…, असो.

लौकिक व्यवहारात मनुष्य प्रेम करतो ते वस्तूसापेक्ष किंवा व्यक्तिसापेक्ष असते. पण परमार्थमार्गात प्रगती सुरु झाली की तेच प्रेम ‘योग’ बनते. सर्वत्र एकच भगवंत आहे अशी पक्की खात्री झाली कि द्वैत गळून पडते आणि सद्गुरु आणि मी एकच आहोत, याची अनुभूती येते. हा साधनेतील परमोच्च बिंदू म्हणता येईल.

निःस्वार्थी प्रेमाची अनुभूती देणारी सर्वात पहिली व्यक्ती म्हणजे आपली जननी (आई). आपल्या बाळाचे लिंग, चेहरा, रंग, सौंदर्य काहीही माहित नसताना ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करते. आपले सद्गुरु देखिल आपली जीवापाड काळजी घेतात, आपण प्रपंचात बुडतोय हे बघून त्यांच्याही जीव आपल्यासाठी तिळ तिळ तुटतो. पण जेंव्हा एखादा ब्रम्हानंद बुवासारखा सत्शिष्य भेटतो तेंव्हा सद्गुरुंना प्रसूतीचा आनंद मिळतो, दोघेही प्रेमात न्हाऊन निघतात, दोघेही एका विशिष्ठ सम पातळीवर एकरूप होतात, मग तिथे कोणी गुरू नसतो, कोणी शिष्य नसतो, सर्वत्र प्रेम प्रेम आणि प्रेम भरून राहते.

” तिर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल… “ असा सर्व परिवार ‘विठ्ठल’ झाल्याची अनुभूती तो साधक घेतो.

संत तुकाराम महाराजांचे पांडुरंगावर निरतिशय प्रेम होते. ते प्रेम पुढील प्रमाणे व्यक्त करतात. साधकांसाठी हा आदर्श ठरावा.

आवडे हे रूप गोजिरे सगुण

पाहता लोचन सुखावले || धृ. ||

*

आता द्रूष्टी पुढे एसाची तू राहे

जो मी तुज पाहे वेळोवेळा || १ ||

*

लाचावले मन लागलीस गोडी

ते जीव न सोडी ऐसे झाले || २ ||

*

तुका म्हणे आम्ही मागावे लडिवाळी

पुरवावी आळी माय बाप || ३ ||

(अभंग क्रमांक ३१३८, सार्थ तुकाराम गाथा. धार्मिक प्रकाशन संस्था)

देवर्षी नारद महाराज की जय!!!

– लेख दुसरा 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अमृताची तळी राखू या… ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? इंद्रधनुष्य ?

☆ अमृताची तळी राखू या… ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

पुढच्या पिढीनं खरा महाराष्ट्र राखला पाहिजे, हे अगदी बरोबर आहे. पण राखण्यासाठी तो आधी जाणून घेतला पाहिजे, त्याला समजून घ्यावं लागेल. तो पर्यटनाच्या आणि मौजमजेच्या पलिकडे जाऊन पहावा लागेल.. !

वेड्या बाभळींमध्ये अडकलेल्या इतिहासाच्या खुणांचे श्वास मोकळे केले पाहिजेत.. गडोगडची दैवतं पाहिली पाहिजेत, पुजली पाहिजेत. तिथं घटकाभर बसून त्या वैभवी काळात डोकावून बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग आपले उघडे डोळे ४०० वर्षं मागं जाऊन गतकाळ पाहू लागतील.

प्रतापगडावरच्या आईभवानीचा आशीर्वाद घेऊन थोरले राजे अफजलखानाच्या भेटीस उतरले तेव्हां प्रतापगडाच्या दरवाज्यास काय वाटलं असेल, हे आपण विचारलंय का कधी? भर पावसात अंधाऱ्या रात्री ज्या राजदिंडीनं राजे पन्हाळा उतरले, ती पार नामशेष होऊ घातलेली दिंडी पाहिलीय का आपण? कधी विचारलंय का तिचं मनोगत? तान्हाजीरावांच्या समाधीपाशी बसलोय का आपण? थोडीथोडकी नव्हे, जवळपास चार शतकं उन्हातान्हाचे मार झेलत उभ्या असलेल्या बाजींच्या समाधीची वास्तपुस्त केली का आपण? “तुटून पडतां मस्तक खाली धुंद धडाने लढलेले” असं ज्यांचं वर्णन आहे, त्या मुरारबाजींची समाधी पाहिली आहे का आपण?

रायरेश्वरावर शिवरायांनी वाहिलेला बेलभंडारा दिसलाय का आपल्याला? महाबळेश्वर क्षेत्री शिवरायांनी त्यांच्या मातोश्रींची केलेली सुवर्णतुला दिसली का आपल्याला? नागोजी जेध्यांच्या घरी सांत्वनासाठी गेलेले शिवाजीराजे आपण पाहण्याचा प्रयत्न केलाय का? आपले बालपणापासूनचे जिवलग मित्र सूर्याजी काकडे धारातीर्थी पडल्याची बातमी कळल्यानंतर शोकाकुल झालेले राजे आपल्याला दिसले का? 

त्र्यंबक सोनदेव डबीर आणि रघुनाथ बल्लाळ कोरडे ही नावं कदाचित कित्येकांना ठाऊकही नसतील. राजे आग्र्याहून निसटले, त्यानंतर फुलादखानाने आग्र्यात जोरदार झाडाझडती सुरु केली. त्यात शिवाजी महाराजांचे हे दोन वकील सापडले. तब्बल नऊ महिने त्यांचा अनन्वित छळ सुरु होता. आपली दोन माणसं हकनाक नरकयातना भोगत आहेत, या जाणिवेनं राजे अस्वस्थ होते. त्यांनी या दोघांच्या सुटकेबाबत औरंगजेबाशी पत्रव्यवहार केला. नऊ महिन्यांनी दोघे सुटले. त्यांना राजगडावर भेटताना राजांच्या मनी कोणते भाव असतील ?

बहिर्जी नाईक असोत, बाळाजी आणि चिमणाजी देशपांडे असोत, कान्होजी जेधे असोत, रामाजी पांगेरा असोत, यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय आपल्या मुलांना व्हायला नको का? महाराजांचे सुवर्ण सिंहासन साकारणारे रामजी दत्तो चित्रे आपल्या मुलांना का ठाऊक नसावेत?

जंजिऱ्याच्या तटाला शिड्या लावून रात्रभर कुमक येण्याची वाट पाहत बसलेल्या लायपाटलाचं कौतुक करणारे शिवाजीराजे, बजाजी नाईक निंबाळकरांची घरवापसी करवून घेणारे शिवाजीराजे, सप्तकोटेश्वराची पुनर्स्थापना करणारे शिवाजीराजे, पाचाड कोटात तक्क्याच्या बावेवर बसून आजुबाजूच्या आयाबहिणींशी सहज गप्पागोष्टी करणारे शिवाजीराजे, स्वतःच्या आईला सती जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे शिवाजीराजे… हे राजे जाणून घेतले तर आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासात किती अमूल्य फरक पडेल.. !

आपला इतिहास, आपल्या परंपरा, आपली संस्कृती, आपली विचारधारा जाणून घेणं हे काम वाटतं तितकं सोपं नाही. मराठी इतिहास इतक्या अतर्क्य आणि विस्मयकारक गोष्टींनी भरलेला आहे की, त्याचा वेध घेताना आपण आजही मंत्रमुग्ध होतो. भल्याभल्यांची मती गुंग होते. पण आपल्या मुलांना ह्या सगळ्याचा परिचय आहे का? आणि तो परिचय असला पाहिजे असं त्यांच्या पालकांना मनापासून वाटतं का?

गावोगावी शालेय मुलांच्या पाठांतराच्या स्पर्धा आयोजित करण्यात येतात. पण त्यात कवी भूषणाचे छंद म्हणून दाखवण्याची स्पर्धा मी पाहिली नाही. शालेय संस्कृत अभ्यासक्रमात सुभाषितमाला असतात. पण त्यात कवींद्र परमानंद गोविंद नेवासकरांच्या शिवभारतातले श्लोक नाहीत. आज्ञापत्र, राज्यव्यवहारकोष यांच्यावर आधारित धडे नाहीत. पोवाडे नाहीत, कवनं नाहीत. परिचय होणार कसा?

संस्कृती आणि इतिहासातल्या उत्तम चंदनी गोष्टी आपल्यापर्यंत आल्या, त्या जतन करण्यासाठी. पुढच्या अनेक पिढ्यांना चांगली प्रेरणा मिळावी, त्यातून त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा मिळावी, त्यांच्या जगण्याला सुबक आकार यावा, असा इतिहासाचा सकारात्मक उपयोग आपल्याला करता येणार नाही का? इतिहासातलं विकसन आणि गुणवत्ता उलगडून दाखवता येईल का? त्यातून या सगळ्या परंपरेचे वारशाचे जाणकार आणि जतनकार तयार होतील का? यासाठी आपण सारे प्रयत्न तरी करुया.

ही अमृताची तळी आपल्या महाराष्ट्राला भरभरुन मिळाली आहेत, हे आपलं भाग्य. आता ती तळी अभ्यासपूर्वक राखणं, पुढच्या पिढ्यांना तयार करणं आणि त्यातलं चैतन्य अक्षय्य जपणं ही तर आपलीच जबाबदारी.. !

© श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “हम Indian Army है… Tension मत लो !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

हम Indian Army है… Tension मत लो ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

ते सैनिक किंवा पोलिस घालतात तशा गणवेशात आले होते… आणि त्यांनी निष्पाप पर्यटकांना ठार मारले… बचावलेले पर्यटक जीव मुठीत घेऊन तिथून पळू लागले.. काही वेळाने त्यांच्याजवळ सैनिकी गणवेशात असलेले आणि शस्त्रे असलेले काही लोक पोहोचले… बचावलेल्या लोकांना आपलाही मृत्यू जवळ आल्याचे दिसू लागले… आमच्या माणसांना मारले… आता आम्हांलाही मारून टाका… असं अगदी हताश, असाहाय्य स्वरात त्यातील काही स्त्रिया म्हणू लागल्या… लहान मुलं तर अत्यंत भेदरलेली होती…. आलेल्या सैनिकांमधील एक ज्येष्ठ सैनिकाच्या दोन वाक्यांनी या लोकांच्या जीवात जीव आला…. हम फौज ही… हम Indian Army है… आपकी सुरक्षा के लिये आये हैं… आप Tension मत लो! 

हे शब्द ऐकल्यानंतरही ही माणसं काही क्षण अविश्वासाने नुसती पहात राहिली.. धापा टाकीत, रडत राहिली.. सैनिकांनी या लोकांना पिण्याचे पाणी दिले… लहान मुलांना जवळ घेतले… आणि त्यांच्या भोवती सुरक्षेचे कडे करून ते उभे राहिले… काहीवेळाने त्या सर्वांची सुरक्षित ठिकाणी रवानगी करण्यात आली!

या हल्ल्यात २६ बळी घेतले गेले… आणि सबंध भारतात शोकाचा आगडोंब उसळला… जे अगदी साहजिकच आहे.

भारतीय सैन्याने गेली साडेसात दशके देशाचं tension अंगाखांद्यावर बाळगलेलं आहे… १९६२, १९६५, १९७१, १९९९ ही चार घोषित युद्धं, श्रीलंकेला पाठवली गेलेली शांतिसेना यांतून हजारो सैनिकांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली आहेच… पण तितकाच त्याग देशांतर्गत शांतता राखण्यासाठीही केला आहे… हे ध्यानात घ्यावे, असे आहे.

एकट्या काश्मिरात १९४७ पासून २०२५ पर्यंत बलिदान दिलेल्या भारतीय सैनिकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. हे सैनिक जर आज हयात असते तर आपल्या सीमा आणखीन बळकट झाल्या असत्या… त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या सहवासाचा अधिक काळ आनंद घेतला असता! 

काश्मिरात भारतीय सैनिकांविषयी रागाची भावना आहे, त्यांना अतिशय अपमानास्पद वागणूक देतात, अतिरेकी त्यांनाच लक्ष्य करतात आणि संधी मिळताच त्यांना ठार केले जाते…. पर्यटकांना ते काही म्हणजे काहीच करीत नाहीत… खुशाल काश्मीर सौंदर्याचा आस्वाद घ्यायला जा…. असाच विचार गेली काही वर्षे केला जात आहे. पहलगाम मध्ये बळी पडलेली ही सव्वीस माणसं आपली.. मग सैनिक कुणाचे आहेत? ते कुणासाठी मरण पत्करताहेत? का ते हातात रायफल असूनही त्यांच्या अंगावर येणा-या स्थानिकांच्या शिव्या खाताहेत.. दगड झेलत आहेत? या याचा विचार भारतीय जनता अगदी अभावाने करताना दिसते!

फारच मोठा हल्ला झाला आणि त्यात जास्त संख्येने सैनिक बळी गेले तरच जनमानसात मोठी खळबळ उडते. एखाद दुसरा बळी गेला की त्याची एक साधी बातमी बनते. मृत सैनिकाचे गाव, त्याचे जवळचे नातलग यांच्या पुरतेच हे दु:ख मर्यादित राहते… अमर रहे म्हणाले की, स्मारक बांधले की कर्तव्य संपले!

एक सैनिक हा हजारो नागरिकांच्या जीवनाचा रक्षक असतो आणि म्हणून त्याचे प्राण महत्वाचे असतात. आणि जेंव्हा त्याचाच बळी जातो तेंव्हा नागरिकांतून शोकासंतप्त प्रतिक्रिया उमटणे अपेक्षित आणि गरजेचे असते. इस्रायल नावाच्या एका छोट्या देशाचे उदाहरण हल्ली सर्वांना ज्ञात आहे.. पण त्यांच्या पावलावर पाऊल टाकायला अजून कुणात हिम्मत आलेली दिसत नाही! त्यांनी सव्वीस मारले म्हणून आपण त्यांचे बावन्न मारावेत, असेही नागरिक म्हणतात. या हिशेबाने तर आजवर हा आकडा काही हजारांच्या वर गेला असता! 

काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, त्यावर आपली सत्ता आहे, तिथे आपली वहिवाट असावी म्हणून तिथे पर्यटकांनी मोठ्या संख्येने जावे म्हणजे तिथली परिस्थिती भारताला अनुकूल होईल.. असाही एक मतप्रवाह आहे… आणि त्याचेच फलित म्हणजे कश्मिरात वर्षागणिक वाढत गेलेली पर्यटकसंख्या आणि अर्थातच त्यांना मिळालेला भरमसाठ पैसा. यातून काही भाग पैसा अतिरेकी कारवायांना जात असणार अशी शंका आहे.

पहलगामच्या हल्ल्यानंतर बहुसंख्य पर्यटक परत निघून आले आणि ज्यांनी आरक्षण केले होते त्यांनी ते रद्द केले. असे होणे ही पहिली प्रतिक्रिया. पण त्यानंतर दुस-याच दिवशी तिथे राहिलेल्या काही पर्यटकांचा एक विडीओ दिसतो त्यात एक महिला म्हणते… छोटी बाते तो होती रहती हैं! 

फेसबुकवरील एका प्रतिक्रियेत एक महिला म्हणते की बळी गेलेला नौदल अधिकारी तर प्रशिक्षित होता.. त्याने प्रतिकार का नाही केला? 

अतिरेक्यांनी हिंदू असेल त्यालाच मारले (आणि त्यांच्या कामात मध्ये आला त्याचा धर्म पाहिला नाही) आणि हे मेलेल्यांच्या आप्तांनी तिथेच लगेच सांगितले आणि ते रेकॉर्ड झाले… हे भारतीयांचे नशीब. अन्यथा असे झालेच नाही असे म्हणायला पाकिस्तानी आणि आपलेही लोक मोकळे झाले असते.

हा हल्ला सत्ताधारी पक्षाने पुढे येणा-या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घडवून आणला आहे… असा दावा करणा-या भारतीय लोकांना या हल्ल्यात बळी गेलेल्या लोकांच्या आत्म्यांनीच बघून घ्यावे… जिवंत माणसांना हे शक्य होणार नाही! 

काहीही झाले तर लष्कराने येऊन लोकांना वाचवावे असे जणू लोकांनी ठरवून ठेवले आहे… पण लष्कराच्या बाजूने कोण कोण उभं आहे… आणि हे उभं राहणं केवळ घोषणा देणं नसतं हे ही लक्षात घ्यावे.

आजचीच बातमी आहे…. बुकींग केलेले वाया जाऊ नये म्हणून अनेक लोक काश्मिरात दाखल झालेले आहेत… आणि स्वर्गाचा आनंद लुटू पहात आहेत! एवढी निर्लज्ज माणसं जगाच्या पाठीवर कुठे नसतील! आणि या तिथे मौजेसाठी गेलेल्या लोकांना लष्कराने संरक्षण द्यावे, अशी त्यांची इच्छा आहे.

काश्मीर मध्ये पर्यटन हा एक फार मोठा व्यवसाय आहे… त्यांच्यासाठी पर्यटक देव असतीलही… पण त्यांना कुठलेही देव चालतील.. फक्त यांनी पैसे दिले पाहिजेत. पहलगाम हल्ल्यानंतरही तिथे जाणा-या लोकांची मानसिकता अनाकलनीय आहे. असो. यावर कोण काय करणार?

कोणत्याही समाजघटकाला या जगाच्या गदारोळात टिकून राहायचे असेल तर एकी हेच बळ. हे पक्ष्यांना समजते…. आपल्या पक्षांना कधी समजणार?

पहलगाम हल्ला झाल्यानंतर सर्व पर्यटक परतले असते तर एक मोठा निषेध नोंदवला गेला नसता का? या पर्यटकांच्या परत जाण्याने तेथील व्यावसायिक कायमचे उपाशी मेले नसते! आणि त्यांनी या आधी गेली कित्येक महिने प्रचंड कमावले होतेच की! त्यांनाही थोडी कळ लागू दिली असती तर काय बिघडले असते? क्रियेला काय प्रतिक्रिया येते त्यावर अनेक बाबी अवलंबून असतात!

एक राष्ट्र म्हणून, एक समाज घटक म्हणून आपण एकमुखी प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती…. असे जोवर होत नाही तोवर…… पहलगाम सारखी अनेक ठिकाणे तिथे आहेत… देशात आहेत… सैनिक त्यांच्या कर्तव्यावर आहेत… ते म्हणत राहतील… हम INDIAN ARMY है…. tension मत लो! आणि आपले लोक त्यांना TENSION देत राहतील!

  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ घिबलीच्या निमित्ताने… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? इंद्रधनुष्य ?

☆ घिबलीच्या निमित्ताने… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

सोशल मीडियावर निरनिराळ्या तांत्रिक कला-प्रकाराचे ट्रेंड्स येत आहेत. आपला फोटो वेगवेगळ्या आर्ट फॉर्ममध्ये बनवणे हा त्यातलाच ट्रेंड. त्यात घिबली आर्ट हा सध्या लोकप्रिय आहे. त्यामुळे कलेच्या विश्वात कलाकारांचे हक्क, त्यांची होणारी हानी, कलेचे सामान्यीकरण, जगण्यातल्या अनेक जागांचं, भावनांचं सपाटीकरण, तांत्रिकतेमुळे नैसर्गिक कलेचं सामान्यीकरण असे अनेक मुद्दे निर्माण झालेत. त्यावर विस्तृत विचारमंथन होऊन समाजात सजगतादेखील निर्माण व्हायला हवी. पण ही जबाबदारी केवळ कलाकार, तंत्रज्ञ किंवा सर्वसामान्य व्यक्ती यापैकी एकाचीच नसून ती सर्वांचीच आहे.

आपणच आपली कलेकडे बघण्याची दृष्टी, तिचं जगण्यातलं स्थान, ‘स्व’ओळख आणि ‘स्व’प्रतिमेबद्दलचं प्रेम, विवेकशीलता, सामाजिक जाणीव, जगण्यातला अभाव-प्रभाव, आभासी जगताचं आयुष्यातलं स्थान याचा विचार करावा. असे ट्रेंड्स फॉलो करणं का गरजेचंय हे तपासायला हवं. एक व्यक्ती म्हणून वेगळ्यावेगळ्या रूपांमध्ये आपण कसे दिसू ही स्वाभाविक इच्छा तंत्रज्ञानातला ‘त’ आणि कलाकृती मधला ‘क’ माहित नसणाऱ्यांनादेखील सहज पूर्ण करता येते. आणि आपण गम्मत, अपुऱ्या इच्छा, स्वप्नं याची थोडीफार पूर्ती होईल म्हणून सहभाग घेतो. क्षणभंगुर आनंदासाठी आभासी जगात रमून आपली माहिती अज्ञात तंत्रज्ञानाला देताना सावध राहायला हवं. कुठलंही तंत्रज्ञान हे सहजासहजी काहीही फुकट देत नाही. त्यामागे त्याचा छुपा हेतू असतोच. या ट्रेंडमुळे फोटो वापरण्याची एक मुभाच आपल्याही नकळत त्याला दिली आहे. माहितीचा हा प्रचंड साठा गोळा करून याचा वापर केला जाणार निश्चितच मात्र तो कसा हे सांगणं अवघड आहे.

कलाकारांच्या दृष्टीने यात दोन बाजू अशा की कलाकाराला, कलाकृतीला मिळालेली ही एक उत्तम दादही आहे. कदाचित यातून कलाप्रकारांचा तात्काळ प्रसार होऊन सकारात्मकता निर्माण होईल. पण त्यापेक्षाही जास्त धोका म्हणजे ‘नैसर्गिक कलेचं’ तांत्रिक कलेद्वारे अवमूल्यन आणि शोषण होईल, झपाट्याने सामान्यीकरण होईल. कलेचं सार्वत्रिकरण होणं वेगळं आणि सामान्यीकरण होणं वेगळं. नैसर्गिक कलेसाठीच्या आवश्यक सरावाला, सातत्याला आणि मुख्यतः वैचारिक कृतीला जे दुय्यमत्व प्राप्त होईल, ते कालांतराने नैसर्गिक मानवीय क्षमतेलाच अतिशय नुकसानकारक ठरेल. कारण कलेचा पायाच मुळी सर्जनशीलता आहे. आणि तो व्यक्तीचं जगणं, अनुभव, संस्कार (कला व जीवन) या सगळ्याच्या पोषणातून निर्माण होतो. प्रथा-परंपरांचं हस्तांतरण, नीती-मूल्यं, भावभावना प्रकटीकरण, नैसर्गिक अनुबंध इत्यादी जगणं संपन्न करणाऱ्या, व्यक्तिमत्त्व घडवणाऱ्या गोष्टींची पूर्तता जर एका क्लिकवर आणून ठेवली तर आपलं जगणं आपणच संकुचित करत आहोत. अर्थपूर्ण गोष्टी आपणहूनच निरर्थक ठरवत आहोत.

आत्ताचा ‘घिबली’ चा ट्रेंड हे प्रतिरूप आहे. मूळ घिबली आर्टमध्ये फक्त विशिष्ट चित्रशैली अभिप्रेत नसून उत्तम कथन करणारी ‘कंटेंट व्हॅल्यु’ महत्त्वाची आहे. त्यातली हाताने काढलेली चित्रं, उबदार रंगसंगती, सौम्य प्रकाश, पार्श्वभूमीचे बारीकसारीक तपशील, वातावरणातली प्रसन्नता, शिवाय अॅनिमेशन्समधल्या हालचाली, संयत वेग यांचा एकत्रित परिणाम म्हणून हा जपानी कलाप्रकार लोकप्रिय झाला. केवळ चित्रप्रकार म्हणून नव्हे हे लक्षात घ्यायला हवं. म्हणजे कृत्रिमतेचा वापर करूच नये का? तर अतिशय मर्यादित आणि अपरिहार्य ठिकाणीच करावा. आपला आनंद, इच्छा व्यक्त्ततेसाठी नैसर्गिक कलेचा आस्वाद, प्रत्यक्ष अनुभूतीच घ्यायला हवी. पदार्थाच्या फोटोतून जशी भूक भागत नाही तसंच आस्वादक आणि कलाकार म्हणून कृत्रिम साधनांवर कला बहरत नाही जिवंत राहणार नाही. याची जाणीव अधोरेखित करण्याचीच ही वेळ आहे.

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ श्रीपरशुरामस्तोत्रम॥ – रचना : श्री वासुदेवानंद सरस्वती  ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ श्रीपरशुरामस्तोत्रम॥ – रचना : श्री वासुदेवानंद सरस्वती  ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

(आज दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी परशुराम जन्मोत्सव आहे. — त्यानिमित्ताने सादर.) 

|| कराभ्यां परशुं चापं दधानं रेनुकात्मजम ||

|| जामदग्न्यं भजे रामं भार्गवं क्षत्रियान्तकम || १ ||

*
|| नमामि भार्गवं रामं रेणुकाचित्तनंदनम || 

|| मोचिताम्बार्तिमुत्पातनाशनं क्षत्रनाशनं || २ || 

*
|| भयार्तस्वजनत्राणतत्परं धर्मतत्परम || 

|| गतवर्गप्रियं शूरं जमदग्निसुतं मतम || ३ ||

*
|| वशीकृतमहादेवं दृप्तभूपकुलान्तकम || 

|| तेजस्विनं कार्तवीर्यनाशनं भवनाशनम || ४ || 

*
|| परशुं दक्षिणे हस्ते वामे च दधतं धनुः || 

|| रम्यं भृगुकुलोत्तंसं घनश्यामं मनोहरम || ५ || 

*
|| शुद्धं बुद्धं महाप्रज्ञामंडितं रणपण्डितं || 

|| रामं श्रीदत्तकरुणाभाजनं विप्ररंजनं || ६ || 

*
|| मार्गणाशोषिताब्ध्यंशं पावनं चिरजीवनं || 

|| य एतानि जपेद्रामनामानि स कृती भवेत || ७ ||

*
॥ इति श्री प. प. वासुदेवानंदसरस्वती विरचितं श्रीपरशुरामस्तोत्रं संपूर्णम् ॥

☆ ☆ ☆ ☆

☆ श्री परशुराम स्तोत्र : मराठी भावानुवाद  ☆

रेणुका तनय धनुर्धारी हाती परशु धारिला

जामदग्नी भार्गव रामा नमन क्षत्रियसंहारकाला ॥१॥

*
भार्गव रामासी वंदन रेणुकाचित्तनंदना नमन

मातृसंकट विमोचक अद्भुत क्षत्रियांचा विनाशन ॥२॥

*
दक्ष भयभीत स्वजनांस्तव दक्ष धर्मा रक्षित 

प्रिय गतवर्गासी वीर जमदग्नी जिवलग सुत ॥३॥

*
महादेवा केले वश दृप्तभूप कुलाचा नाश

तेजोमय कार्तवीर्य संहारक करी भवभयनाश ॥४॥

*
दक्षिण करात परशु धरिला वाम हस्ते धरी धनू

भृगुकुलवंशज रमणीय मनोहारी घनश्याम तनू ॥५॥

*

शुद्ध बुद्ध महाप्रज्ञावान पण्डित रणधुरंधर

श्रीदत्तकरुणापात्र राम विप्रगणांचे करी रंजन ॥६॥

*
चिरंजीव पावन पंथे शोषितो अंश सागराचा 

जपतो जो राम नामासी प्रसाद तया कार्यसिद्धीचा ॥७॥

*

॥ इति श्री प. प. वासुदेवानंदसरस्वती विरचित निशिकान्त भावानुवादित श्रीपरशुरामस्तोत्र संपूर्ण ॥

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares