मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘गरुड भरारी…’ – लेखिका : नीला महाबळ गोडबोले  ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘गरुड भरारी…’ – लेखिका : नीला महाबळ गोडबोले  ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर

प्राचीन भारतात स्वयंवराची पद्धत होती. स्त्री स्वत:च्या अटींवर पारखून आपला जोडीदार निवडत असे.

सीता, द्रौपदी स्वयंवराची आपल्याला माहिती आहेच.

काळ बदलला. पुरुषप्रधान संस्कृती राज्य करू लागली. जोडीदाराला निवडायचा अधिकार आता पुरुषाकडे आला..

प्राणी पक्षी मात्र अजूनही बदलले नाहीत. निसर्गाने त्यांना जे शिकवले त्यानुसार ते आजही तसेच मार्गक्रमण करीत आहेत.

प्रजननाच्या काळात आजही बहुतांश प्राणी-पक्षी जगतात माद्या आपला नर साथीदार निवडतात.

गरुडांची ही अतिशय रोचक वरपरीक्षा..

गरुडांचा जेंव्हा प्रजननाचा काळ जवळ येतो तेंव्हा अनेक नर गरूड मादीभोवती जमा होतात.

त्यातून बरा दिसणारा नर मादी निवडते आणि त्याला अंतिम निवडप्रक्रियेसाठी आवतण देते.

– – परीक्षा सुरू होते.

मादी स्वत:च्या चोचीत एक काडी धरते नि आकाशात उंच उंच उडत जाते.

नराने तिच्यामागून उडत जायचे… पण तिच्या पेक्षा वर जायचे नाही. खालच्या पातळीवर राहून सगळे लक्ष मादीवर केंद्रित करायचे.

मादी केंव्हाही तोंडातील काडी खाली टाकते. ती नराने पकडायची. ती तो पकडू शकला तर चाचणीच्या पुढच्या पातळीत त्याला प्रवेश.. नाहीतर तो नापास..

 

आता दुस-या पातळीत काडीचा आकार नि वजन वाढतं.. बाकी प्रक्रिया तीच..

 

पुढील प्रत्येक पातळीत काडी मोठी मोठी होत जाते.

 

आता काडीचं रुपांतर काठीत होत जातं.

शेवटच्या पायरीतील काठी साधारण गरुडपिल्लाच्या वजनाइतकी असते.

 

– – परीक्षेच्या सर्व पातळ्यात यशस्वीरीत्या उत्तीर्ण होणा-या नराच्या गळ्यात वरमाळा पडते. वधुवर आकाशात नृत्य करून आपला विवाहसोहळा पार पडतात..

 

सुरक्षित असा उंच वृक्ष शोधून त्यावर घरटं बनतं, दोघांच्याच हिमतीवर.. इतर कुणाच्याही आधाराशिवाय.. त्या सुंदरशा घरट्यात मादीचं बाळंतपण होतं.. फक्त जोडीदाराच्या साथीनं..

ना मादीचे आई वडील मदतीला असतात ना सासुसासरे…

मादी अंडी उबवत असते तेंव्हा नर अन्न मिळवून आणतो मादीसाठी नि स्वत:साठी..

” मी कमावता आहे बरं का, मी सांगेन तसच झालं पाहिजे ” असला कोणताच अहंकार त्याच्यात नसतो..

” माझं कमावणं बंद झालं.. माझी अस्मिता आता धोक्यात येईल का ?” असली असुरक्षितता ना तिच्यात असते..

 

अंड्यातून पिल्लं बाहेर येतात.. तरीही त्यांचे बाबाच अन्नार्जन करीत असतात..

पिल्लं मोठी होतात..

पिल्लांची आई अंडी उबवून उबवून स्वत:च उबलेली असते..

 

” राणी, तू कंटाळली असशील नं? 

तुझे पंख भरारी घेण्याचं विसरण्याआधीच मोकळ्या आकाशात मस्त उड्डाण कर.. खूप उंचावर जा.. पिल्लांचं उदरभरण करायची जबाबदारी आता तुझी…. आणि हो, आपल्या बछड्यांची आजिबात काळजी करू नकोस.. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आता माझी.. “

 

गरूडच ती.. तिचे पंख झेप घेणं विसरलेले नसतात. ती मोकळ्या आकाशात विहरत राहते.. पिल्लांना आवडणारं, त्यांना सशक्त बनवणारं अन्न गोळा करते.. पण त्या माऊलीचं लक्ष मात्र त्या विस्तीर्ण आकाशातून तिच्या पिल्लांकडेच असतं!!

” माझे काळजाचे तुकडे भांडत नाहीत नं, त्यांना कुणी त्रास तर देत नाही नं, त्यांना कुठे दुखत खुपत नाही नं ?” सगळ्याचा ते मातृहृदय कोसांवरून अंदाज घेत असतं..

 

पिल्लांच्या पंखांत आता जोर आलेला असतो..

निळ्याशार आकाशात उडण्याची त्यांना घाई झालेली असते..

घरट्याच्या दाराशी यायचं, बाहेर डोकावायचं नि घाबरून आत पळून जायचं…. असले त्यांचे उपद्व्याप त्यांची माय प्रेमानं न्याहाळत असते..

 नि “माझं लेकरू घरट्यातून जमिनीवर पडणार तर नाही ना ?” म्हणून काळजीही करत असते..

 

बच्च्यांचे बाबा या वेळात घरट्याच्या खालच्या फांदीवर बसलेले असतात.. वृक्षाभोवती घिरट्या घालणा-या शत्रुंपासून आपल्या पोरांचं रक्षण करत…

 

पण ते तर त्यांना घरट्याशेजारीही बसूनही करता आलं असतं.. मग खालच्या फांदीवर का?

– – तर एखाद्या पिल्लानं अवखळपणानं घरट्यातून उडी मारली नि ते खाली पडायला लागलं तर त्याला झेलण्यासाठी…

त्याची ही पिल्लांना झेलण्याची, पकडण्याची क्षमता अजमावण्यासाठी म्हणून तर त्या आईने लेकरांना जन्माला घालण्याआधीच भावी पित्याची घेतलेली ती काडी परीक्षा.. !! – – काड्या पकडता आल्या म्हणजे या पात्राला पिल्लांना झेलता येणार….. केवढी ही हुशारी !!

 

“ती आकाशात विहरतेय उंचावर… मी मात्रं खालच्या पातळीवर रहायचं.. इतर पक्षी काय म्हणतील? माझ्यावर हसतील ? माझी प्रतिष्ठा कमी होईल ? गरुडीणबाई मला कमी लेखायला लागेल? माझा अपमान करेल? ” 

…… असले नगण्य, विकृत विचार त्याच्या आसपासही फिरकत नाहीत..

 

” मी फिरून फिरून कष्ट करतेय नि हा ठोंब्या नुसता बसून खातोय ” ना असल्या कोत्या विचारांचा तिच्या मेंदूत शिरकाव होत…

 

त्या दोघांचं एकच लक्ष्य असतं..

” पिल्लांचं संगोपन नि संरक्षण “…. ना त्यांना अहंकार असतो ना जगाची फिकीर..

 

त्या़ना माहीत असतं … आपल्या पिल्लांना आपल्या दोघांशिवाय तिसरं कोणीही नाहीये..

आपण जन्म दिलाय तर ते स्वतंत्र होईपर्यंत त्यांना सांभाळण्याची जबाबदारी हे आपले एकमेव कर्तव्य आहे.. म्हणूनच ते कर्तव्य ते जगाची फिकीर न करता पार पाडतात..

यात कधी मादी कमीपणा घेते तर कधी नर…

 

एकदा का पिल्लं उंच भरारी मारून जगाच्या पसा-यात नाहीशी झाली की मग दोघे आपापल्या विश्वात गायब होतात..

पण तोपर्यंत दोघांचं फक्त एकच विश्व ” मिशन बाळोबा !! “

गरुडांच्या या शहाणपणाची गोष्ट मी काल माझ्या नव-याकडून ऐकली. नि वाटलं…

गरुडाच्या दसपट मोठा नि प्रगत मेंदू असणा-या माणसाला हे शहाणपण का बरं येत नाही?

वंशसातत्याच्या उद्देशानं केलेल्या विवाहनामक प्रक्रियेत होणा-या बाळांपेक्षा पैसा, शिक्षण, मालमत्ता, नातीगोती यांनाच का महत्त्व दिलं जातं?

 

– – नेहमी नरानं मादीपेक्षा जास्त उंचीवर असलं पाहिजे… दाणा पाणी मिळवण्याची जबाबदारी पुरुषानेच घेतली पाहिजे… असं का?

– – नराएवढी उंची गाठण्याचा मादीचा नि मादीपेक्षा उंच उडण्याचा नराचा अट्टाहास कशासाठी ?

– – कधी मादीनं उंच उडावं तर कधी नरानं..

– – दोघंही अहंकारापोटी उंच आकाशात भरा-या मारत बसले तर त्या बिचा-या लेकरांना कोण सांभाळणार? ती पडायला लागली तर त्यांना कोण झेलणार?

– – उबेची गरज असण्याच्या काळात माऊलीऐवजी कामवाली किंवा पाळणाघरातील मावशी त्यांच्यावर पंखांची पखरण करणार ? त्या विकत घेतलेल्या उबेने त्यांचे पंख बळकट होतील?

– – मी पडलो तर माझा बाबा मला झेलायला खाली उभा आहे, या खात्रीवर मारलेली पहिली भरारी यशस्वी होईल की अहंकाराच्या युद्धात घरटं सोडून निघून गेलेल्या तथाकथित बाप नामक प्राण्याच्या आठवणींचे कढ काढत बिचकत बिचकत आकाशातला प्रवेश सुखकर होईल… ?

लेखिका : नीला महाबळ गोडबोले, सोलापूर….

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — १४  — गुणत्रयविभागयोग — (श्लोक ११ ते २0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १४  — गुणत्रयविभागयोग — (श्लोक ११ ते २0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

सर्वद्वारेषु देहेऽस्मिन्प्रकाश उपजायते । 

ज्ञानं यदा तदा विद्याद्विवृद्धं सत्त्वमित्युत ॥ ११ ॥

*

देहात इंद्रिये अंतःकरणी होता जागृत चैतन्य

विवेकबुद्धी हो उत्पन्न वृद्धिंगत होता सत्वगुण ॥११॥

*

लोभः प्रवृत्तिरारम्भः कर्मणामशमः स्पृहा । 

रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ ॥ १२ ॥

*

लोभ प्रवृत्ती स्वार्थ प्रेरित कर्मफलाशेने कर्म

अशांती कामलालसा हे रजोगुणवृद्धीचे वर्म ॥१२॥

*

अप्रकाशोऽप्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च । 

तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरुनन्दन ॥ १३ ॥

*

अंधःकार अंतःकरणी गात्रात उदासीनता कर्मात

निद्राप्रियता अकारण चळवळ तमोगुणाच्या वृद्धीत ॥१३॥

*

यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत्‌ । 

तदोत्तमविदां लोकानमलान्प्रतिपद्यते ॥ १४ ॥

*

सत्त्वगुणाची वृद्धी असता होता देहाचे पतन 

आत्म्यासी त्या निर्मल दिव्य स्वर्गप्राप्ती पावन ॥१४॥

*

रजसि प्रलयं गत्वा कर्मसङ्गिषु जायते । 

तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते ॥ १५ ॥

*

रजोगुणाची वृद्धी असता होता देहाचे पतन

कर्मासक्त नरदेही वा मूढयोनीत त्यासी जनन ॥१५॥

*

कर्मणः सुकृतस्याहुः सात्त्विकं निर्मलं फलम्‌ । 

रजसस्तु फलं दुःखमज्ञानं तमसः फलम्‌ ॥ १६ ॥

*

सात्त्विक कर्माचे फल सात्विक सुख वैराग्य ज्ञान

राजस कर्माचे फल दुःख तामस कर्मफल अज्ञान ॥१६॥

*

सत्त्वात्सञ्जायते ज्ञानं रजसो लोभ एव च । 

प्रमादमोहौ तमसो भवतोऽज्ञानमेव च ॥ १७ ॥

*

सत्त्वगुणे ज्ञानोत्पत्ती लोभ रजोगुणापासून 

मोह प्रमाद उत्पत्ती होतसे तमोगुणापासून ॥१७॥

*

ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः । 

जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः ॥ १८ ॥

*

सत्वगुणींना लाभे ऊर्ध्वगती मध्ये तिष्ठत रजोगुणी

नीच वृत्तीत रमुनी अधोगती प्राप्त करित तमोगुणी ॥ १८॥

*

नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति । 

गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति ॥ १९ ॥

*

त्रिगुण केवळ नाही कर्ता करितो दुजा कोणी

सच्चिदानंदघन त्रिगुणातीत परमात्मा जाणी

तत्वज्ञानी जाणावे त्या द्रष्टा पुरुष म्हणुनी

मम स्वरूपा प्राप्त होई तो त्रिगुणमुक्त होउनी ॥१९॥

*

गुणानेतानतीत्य त्रीन्देही देहसमुद्भवान्‌ । 

जन्ममृत्युजरादुःखैर्विमुक्तोऽमृतमश्नुते ॥ २० ॥

*

देहोत्पत्तीला कारण तिन्ही गुणांना उल्लंघुन

परमानंदी तयास मुक्ती जननमरणजरे पासुन ॥२०॥

 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कामगारांची खंत… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? इंद्रधनुष्य ?

कामगारांची खंत… ☆ सौ. वृंदा गंभीर

सोमवारी सकाळी मी कामाच्या गडबडीत होते, माझ्या फोनची रिंग आली जरा वैतागतच फोन घेतला आणि हॅल्लो म्हणाले, , , , , तिकडून मॅडम नमस्कार मी एक पट्रोल पंप कामगार बोलतोय मी तुमची कथा वाचली मला फार आवडली खूप छान प्रबोधन केलं तुम्ही असं थोडंसं कौतुक करून त्यांनी त्यांची समस्या सांगण्यास सुरवात केली.

ते म्हणाले माझं वय “66” वर्ष आहे मी पेट्रोल पंपावर काम करतो. गेली दहा बारा वर्ष झाले मी हे काम करतो. खूप अडचणी असतात या कामात वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना तोंड द्यावं लागतं ऊन, वारा, पाऊस झेलत चोवीस तास उभं राहावं लागतं.

आमची दाखल कोणीच घेत नाही वाहतूक ही दळणवळनाच साधन आहे तसाच इंधन ही जरुरीचे आहे त्यासाठी कामगार महत्वाचे आहे.

कोरोनाच्या काळात घरी न जाता आम्ही पंपावर काम केलं कुणी कोरोना झालेलं पण स्पर्श करून जायचं मास्क कोणी लावत नव्हतं तरी आम्ही काम केलं तरीही आमचा उल्लेख कुठेच नाही कुणाला देव म्हणाले कुणाला देवदूत म्हणाले कुणाला रक्षणकर्ता तर कुणाला पाठीराखा म्हणाले.

सर्वांचे सत्कार झाले सगळीकडे कौतुक झाले मग आमचे का नाही आम्हीपण पोटासाठी का होईना पण सेवाच करतो ना? मग आमची का दाखल घेतली गेली नाही.

आमच्याही काही मागण्या आहेत, अपेक्षा आहेत आम्हाला सुरक्षा हवी असते आम्हाला कुटुंब आहेत थोडं तरी लक्ष द्या………

रोज भांडण कटकटी कधी कधी तर मारामाऱ्या, दादागिरी करणारे कुणी पेट्रोल डिझेल भरून निघून जाणारे कुणी पैसे नाही दिले तरी दिले म्हणणारे त्यांना तोंड देत दिवस भर काम करायचं रात्री मॅनेजर कडे हिशोब द्यायचा हिशोब कमी भरला कि आमच्या पगारातून पैसे कट करायचे यात आमचा काय दोष एकतर पगार कमी त्यात अशी कटींग झाली कि महिन्याचा खर्ष भागवन कठीण होऊन जातं कसबस घर भगवावं लागतं.

कधी मनासारखं जगता येत नाही कुटुंबाला वेळ देता येत नाही. पंपाचा सेल कमी झाला कि पगार कमी अशा अनेक समस्यांना तोंड देत आम्ही पंपावर उभे असतो जनतेच्या सेवेसाठी मग एखादा सत्कार आमचा का नको, एखादी कौतुकाची थाप आमच्या पाठीवर का नको, सरकार कडून थोडं अर्थसहाय्य का नको ही अपेक्षा चुकीची आहे का?

एक कामगार कामात होता त्याच्या घरून फोन आला मुलीला खूप ताप आला आहे तुम्ही घरी या तिला घेऊन दवाखान्यात जावं लागेल पण त्याला बदली कामगार नसल्यामुळे जाता आलं नाही. घरची परिस्थिती नाजूक होती त्यांनी घराजवळच्या DR कडे नेलं त्यांनी तिला दुसरीकडे घेऊन जायला सांगितलं पैसे नसल्यामुळे जाता आलं नाही. बरोबर कुणीच नाही त्या मुलीला घरी आणलं दुसऱ्यादिवशी 

वडिलांची ड्युटी संपून वडील घरी येईपर्यंत तिने प्राण सोडला होता.

 किती हृदयद्रावक घटना आहे ही काळीज हेलावून टाकणारी मन सुन्न करणारी.

 सरकारने जरा लक्ष घऊन किमान वेतन आणि थोडी सुरक्षा दिली तर असं होणार नाही.

शेवटी ” कामगार जिंदाबाद “

” माणूस मालक तेंव्हाच होतो, जेंव्हा कामगार काम करत असतो “

 म्हणून कामगारांना चांगली माणूस म्हणून वागणूक द्या.

” कामगार आहेतर मालक आहे ” हे लक्षात असुद्या 

” सर्व कामगारांना मनाचा मुजरा “

सलाम, सलाम, सलाम 

© दत्तकन्या (सौ. वृंदा पंकज गंभीर)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मृत्यूशी झुंज अपयशी पण.. हृदय अजूनही धडधडतंय !” लेखक : अज्ञात ☆ माहिती प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “मृत्यूशी झुंज अपयशी पण.. हृदय अजूनही धडधडतंय !”  लेखक : अज्ञात ☆ माहिती प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

पत्रकार प्रसाद गोसावी

(प्रसाद गोसावी ठरले अवयवदान करणारा पहिला पत्रकार)

पुण्यातील ‘पोलिसनामा’ या न्यूज पोर्टलचे वरिष्ठ वार्ताहर प्रसाद गजानन गोसावी यांचे रविवार दि. १ सप्टेंबर रोजी निधन झाले. पावणेदोन महिन्यांपूर्वी गंभीर अपघात झाल्यामुळे त्यांच्यावर निगडीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मृत्यूवर मात करतील असे वाटत असतानाच प्रसाद यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर प्रसाद यांचे अवयव दान करण्यात आले. या स्तुत्य निर्णयामुळे प्रसाद हे अवयवदान करणारे पहिले पत्रकार ठरले आहेत. एवढेच नाही तर त्याच्या मृत्यूनंतर काही तासातच त्याच्या हृदयाचे दुसऱ्या एका लष्करी जवानाच्या शरीरात यशस्वीपणे प्रत्यारोपण देखील करण्यात आले. त्यामुळे प्रसादने मृत्युसोबत केलेली झुंज अपयशी ठरली असली तरीही आजही त्याचे हृदय धडधडते आहे. हृदयाबरोबरच दोन फुफ्फुसे (lungs), यकृत (liver), व एक मूत्रपिंड (kidney) व दोन डोळे या अवयवांचेही दान करण्यात आले. त्यामुळे एकूण पाच रुग्णांना नवीन जीवन मिळाले.

प्रसाद गोसावी याच्या दुचाकीला सव्वा महिन्यांपूर्वी ऑफिसमधून घरी येत असताना खडकी रेल्वे स्टेशनजवळ गंभीर अपघात झाला होता. त्याच्यावर निगडीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या अपघातात त्याच्या मेंदूला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्याचा जीव वाचवण्याचे आव्हान डॉक्टरांच्या पुढे होते. उपचार सुरु असतानाच पायाच्या संवेदना नाहीशा झाल्यामुळे दुर्दैवाने त्याचा उजवा पाय पोटरीपासून काढण्याचा निर्णय घ्यावा लागला. कारण त्याचा जीव वाचणे महत्वाचे होते. त्यानंतर त्याची प्रकृती सुधारत असतानाच अचानक मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याची शुद्ध हरपली. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण प्रसादच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. अखेर डॉक्टरांनी प्रसाद ब्रेनडेड झाल्याचे घोषित केले. या बातमीमुळे प्रसादच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. पण या परिस्थितीत डगमगून न जाता त्यांनी प्रसादचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. प्रसादचे डोळे, हृदय, दोन फुप्फुसे, वकृत्व एक किडनी हे अवयव काढून घेण्यात आले.

प्रसादचे हृदय नेण्यासाठी पिंपरीपासून पुण्यापर्यंत ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. पोलीस व लष्करी जवानांच्या संरक्षणात त्याचे हृदय पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात आले. त्यावेळी डी वाय पाटील रुग्णालयातील सर्व डॉक्टर व व कर्मचाऱ्यांनी प्रसादला सलामी दिली. एवढेच नाही तर त्याच्या मृत्यूनंतर काही तासातच त्याचे हृदय पुण्याच्या सदर्न कमांड हॉस्पिटलमध्ये नेण्यात येऊन त्या ठिकाणी एका जवानावर हृदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. अवयवदानानंतर त्याचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. निगडीच्या स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आज प्रसाद या जगात नसला तरीही त्याचे हृदय अजूनही धडधडत आहे. भविष्यात एखाद्याला त्याच्या डोळ्यांनी हे जग पाहता येणार आहे. यकृत, फुप्फुसे व किडनी मिळाल्यामुळे संबंधित रुग्णांना नवीन जीवन मिळणार आहे. आपल्या मृत्यूनंतर अवयवदान करणारा पहिला पत्रकार म्हणून प्रसाद गोसावी कायमस्वरूपी लक्षात राहतील.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सुवर्णवेध… ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ सुवर्णवेध… ☆ श्री संभाजी बबन गायके 

(भारतीय सेनेच्या राष्ट्रीय रायफल्सचा अचूक लक्ष्यवेध !) 

तिचे डोळे भेदक आहेत… तिच्या पायांतील धनुष्याची प्रत्यंचा प्रचंड आवेगाने ताणलेली असते तिने… श्वास रोखून धरलेला असतो तिने आणि ते पहात असलेल्या माणसांनी सुद्धा. बाण निघतो.. वा-याशी गुजगोष्टी करीत… जणू एखाद्या सुंदर कवितेतील शब्द त्यांच्यातून अपेक्षित अर्थासह ऐकणा-याच्या कानांवर पडत राहावेत… तसा बाण अचूक जाऊन स्थिरावतो लक्ष्याच्या काळजात… मधोमध! हा सुवर्णवेध असतो! 

नोव्हेंबर, २०१६. बंगळूरू. दोन नवे कोरे करकरीत हात बसवल्यावर “तू सर्वांत आधी काय करशील?” असा प्रश्न निष्णात अस्थिशल्य चिकित्सक डॉक्टर शिवकांत यांनी तिला विचारला… त्यावर तिने उत्तर दिले, ”मला माझ्या या हातांत बांगड्या घालायच्या आहेत!” 

पंधरा वर्षांची नवतरुण पोर ती… या वयात तिला चारचौघींसारखं नटायला आवडणं साहजिकच होतं. ती जन्मलीच मुळी दोन्ही हातांविना. Phogomelia नावाचा एक अत्यंत दुर्मिळ विकार तिला झाला होता. आईच्या गर्भातच बाळाच्या हातांची वाढ खुंटते. हात खांद्यापाशी सुरु होतो आणि तिथेच संपतो. पण तिच्या आई-वडिलांनी याही स्थितीत तिला जगवलं, वाढवलं आणि शाळेतही घातलं. मुलली हाताशी नसते तेंव्हा आईला अगदी हात मोडल्यासारखं वाटतं.. इथे तर या मुलीला हातच नव्हते. ती तिला कशी मदत करणार घरात, शेतात? आणि तिचं तिला स्वत:चं सुद्धा तसं काहीच करता येत नव्हतं. पण पोटाचा गोळा… आई-बाप कसा बारा टाकून देतील? 

जम्मू-कश्मीर मधल्या ज्या अत्यंत दुर्गम अशा किश्तवाड जिल्ह्यातील लोईधार गावात ही पोर जन्माला आली तो भाग डोंगर द-यांनी वेढलेला. ही आपल्या कोवळ्या पायांनी दुडूदुडू धावायला शिकली आणि तिला सर्व डोंगर पायांखाली घालायचे बाळकडू मिळाले. केवळ पायांच्या साहाय्याने ती चक्क झाडांवर चढू उतरू लागली… पण तिच्या भविष्याच्या वाटेवर खोल दरी होती… आणि त्या दरीत ती आज न उद्या कोसळणार होती.

तिच्या राज्यात राष्ट्रीय रायफल्स ही तिच्याच देशाची मोठी लष्करी तुकडी तैनात आहे. तिच्या राज्यातली काही माणसं इतरांच्या सांगण्यावरून आपल्याच देशाविरोधात उभी राहीली तेंव्हा देशाने त्यांच्या बंदोबस्तासाठी हे सैनिक तिच्या राज्यात पाठवले होते. पण हे सैन्य केवळ बंदुकीच्या जोरावर मतपरिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करीत नाही, तर ‘सदभावना’ जागृत करून चुकीच्या मार्गाने जाऊ पाहणा-या युवकांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करीत असते. राष्ट्रीय रायफल्स, डोग्रा रेजिमेंटने मुघल मैदान येथे आयोजीत केलेल्या अशाच एका सद्भावना कार्यक्रमात अत्यंत चपळ, उत्साही असलेली ‘ती’ लष्करी अधिका-यांच्या नजरेस पडली… आणि वर वर कठोर भासणा-या सहृदयी लष्कराने तिला आपल्या पंखांखाली घेतले आणि आकाशात भरारी मारण्यास उद्युक्त केले!

देशासाठी प्राणार्पण केलेल्या मेजर अक्षय गिरीश साहेबांच्या मातोश्री मेघना गिरीश ह्या आपल्या शूर मुलाच्या स्मरणार्थ मदत संस्था चालवतात. लष्कराने त्यांच्याशी या मुलीच्या पुनर्वसनासंदर्भात संपर्क साधला. त्यांनी अभिनेते अनुपम खेर यांच्याही कानांवर ही बाब घातली. The Being You नावाने NGO (बिगर शासकीय संस्था) चालवणा-या समाजसेविका प्रीती राय यांनीही तिच्या केस मध्ये समरसून लक्ष घातले.

तिच्या शरीराची रचनाच अशी होती की कृत्रिम हात बसवूनही फारसा उपयोग होणार नव्हता. पण तरीही त्यांनी हा प्रयत्न करून पाहिला. आणि त्याचवेळी प्रीती राय यांनी तिचा परिचय दिव्यांग जलतरणपटू शरथ गायकवाड, अंधांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचे कर्णधार शेखर नाईक यांच्याशी करून दिला. दिव्यांग व्यक्ती क्रीडा प्रकारांत अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी होऊ शकतात, हे तिला नव्याने समजले. तिचे सर्वांग या नव्या साहसासाठी आतुर झाले.

प्रीती राय यांना मार्क स्टूटझमन नावाचा एक ऑलिम्पिक विजेता धनुर्धर माहित होता. दोन्ही हात नसताना केवळ पायांच्या साहाय्याने मार्क अगदी बिनचूक लक्ष्य वेधण्यात निष्णात होते. त्यांच्याच पावलांवर हिने पाऊल टाकले तर ही कमाल करून दाखवेल असा विश्वास सर्वांना वाटला. वैष्णोदेवी मंदिर ट्रस्टने तिची प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दोन प्रशिक्षक तिथे तिला लाभले.. कुलदीप वैधवान आणि अभिलाषा चौधरी. वैष्णोदेवी जवळच्या कटरा येथे प्रशिक्षण केंद्र होते. घरापासून कधी फारशी दूर न गेलेली ती.. आता तिच्या घरापासून तब्बल दोनशे किलोमीटर्सवर असलेल्या या अनोळखी ठिकाणी काहीतरी करून दाखवण्याच्या भक्कम इराद्याने आली… सोबत तिची आई शक्ती देवी सुद्धा आली होती. वडील आणि मोठी बहीण गावी शेती पाहण्यासाठी थांबली. सराव सुरू झाला. दोन पाय, दोन खांदे एवढेच काय ते तिच्यापाशी होते… धनुष्याची प्रत्यंचा ताणायला आणि बाण सोडायला. पायांत पेन्सिल धरून लिहायला ती शाळेत शिकली होतीच. तिला धनुष्याची दोरी चढवणे अवघड गेले नाही. पण बाण सोडायचा कसा? तिच्या प्रशिक्षकांनी स्वत: एक छोटे उपकरण विकसित केले.. जे तोंडात धरले की त्याच्या साहाय्याने बाण सोडता येतो! एकलव्याला अंगठा नव्हता… आणि हिला हात. पण काहीही अडले नाही. ती एका पायाने दोरी ओढते… जबड्याखाली दाबून धरते… एक डोळा मिटून घेते… ती अर्जुन बनते! अल्पावधीतच तिचे बाण नेमके लक्ष्यवेध करू लागले. अशा प्रकारे बाण मारू शकणारी ती… जगातली पहिली महिला ठरली… आणि या धनार्विद्येच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारात पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू. सराव सुरू केल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत ती आंतरराष्ट्रीय धनुर्धर बनली. आशियाई स्पर्धेत चीन मध्ये, नंतर युरोपमध्ये झालेल्या दिव्यांग खेळाडूंच्या स्पर्धांत ती चमकली. एक नव्हे तर दोन सुवर्णपदके तिने पटकावली. एका स्पर्धेत तर ती प्रचंड आजारी असताना, सलाईन लावावे लागले अशा स्थितीत खेळली आणि जिंकली… यामागे तिची मेहनत, प्रशिक्षकांची चिकाटी आणि भारतीय लष्कराचे पाठबळ यांसारख्या अनेक बाबी होत्या… यश असे सहजासहजी मिळत नसते! 

ती भारतात परतली प्रचंड आत्मविश्वास घेऊन. आपण जिंकू शकतो याची जिद्द बाळगून. भारत सरकारने माननीय राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे हस्ते तिला अर्जुन हा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार प्रदान करून गौरविले. मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनीही तिला विशेष प्रोत्साहन दिले.

तिच्या यशाचे श्रेय तिने सर्वप्रथम तिच्या आईला दिले…. मां है तो मुमकीन है.. असे ती म्हणते. शक्ती देवी हे तिच्या आईचे नाव. ही निरक्षर आई तिच्या सोबत शक्ती बनून उभी राहिली! तिची कामगिरी पाहून प्रचंड प्रभावित झालेले उद्योगपती महिंद्र यांनी तिला दिव्यांग व्यक्तीसाठी विशेष रचना असलेली मोटार कार भेट देण्याची घोषणा केली. तेंव्हा तिने ‘मी १७ वर्षांची आहे.. सज्ञान झाल्यावर आपली भेट स्वीकारेन.. ’ असे महिंद्र यांना नम्रपणे कळवले!

ही म्हणजे Paris दिव्यांग ऑलिम्पिक मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करीत यश संपादन करून देशाला पदक मिळवून देणारी शीतल मानसिंग देवी! 

भारतीय लष्कराने या बलशाली मुलीला खेड्यातून थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले. राष्ट्रीय रायफल्स आणि लेखात उल्लेख केलेल्या इतर सर्व संबंधित व्यक्ती, संस्थांचे आणि अज्ञात सहका-यांचे हार्दिक अभिनंदन! जय हिंद!  🇮🇳

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वारूळ ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

?इंद्रधनुष्य? 

☆ वारूळ ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

 चल गं सये वारुळाला, वारुळाला

 नागोबाला पुजायला पुजायला

 नागपंचमीच्या अनेक लोकगीतातील हे एक गीत शेताच्या बांधावर, रस्त्याच्या कडेला, शेताच्या एका कडेला किंवा पडीक माळरानात आपल्याला वारूळ दिसते. या(आयत्या) वारुळात साप, नाग राहतात ते शेतकऱ्यांचे मित्र असतात म्हणून वारुळांची पूजा नागपंचमीच्या आदल्या दिवशी केली जाते. तसेच वारुळात असणाऱ्या मुंग्यांना देखील लाह्या खायला देतात. याचे कारण पावसाळ्यात त्यांना वारुळाच्या बाहेर येऊन अन्न गोळा करणे शक्य नसते. यावरूनच शेतकऱ्यांच्या शेती जीवनातील वारुळाचे महत्त्व आपणास कळते. पूर्वीच्या माणसांना विज्ञान माहीत नव्हते मात्र अनुभवाचे ज्ञान दररोजच्या निरीक्षणातून पक्के होते. तो निसर्गातील वेगवेगळ्या चमत्काराबद्दल, किमयेबद्दल, सूक्ष्म बदलाबद्दल परिचित होता म्हणूनच निसर्गाबद्दल तो कृतज्ञ होता. पूर्वजांच्या सर्व चालीरितींचे अनुकरण आणि परंपरांचे पालन करत होता. निसर्गाचा कोप होऊ नये म्हणून निसर्ग जपत होता, त्याची पूजाही करत होता.

निसर्ग आपला नेहमीच मार्गदर्शक असतो, निसर्गातील प्रत्येक घटक मानवास एक उपदेश, संदेश देत असतो. मुंगी निसर्गातील एक छोटासा घटक पण तिचे जीवन आपल्यापुढे एक आदर्श आहे. त्यांचे घर, एकोपा, परस्पर साहचर्य, नियोजन, चिवटपणा, जिद्द सर्वच गोष्टी माणसाने शिकण्यासारख्या आहेत.

मुंग्यांच्या घराला वारूळ असे म्हणतात. इंग्रजीत anthill. मातीचे कण आणि तोंडातील चिकट द्रवाला एकत्र करून मुंग्या वारूळ बांधतात. वरून साधे सोपे वाटणारे वारूळ आतून मात्र खोल खोल गुंतागुंतीच्या कप्प्यांचे असते. म्हणूनच पूर्वीच्या दंतकथामध्ये वारुळांच्या खाली भुयार, राजमहाल असल्याचे काल्पनिक उल्लेख आहेत. वारुळांची रचना अशी गूढच असते. वारुळाची रचना टोकाकडे निमुळती असल्याने कितीही पाऊस पडला तर पाणी वरून वाहून जाते आणि वारूळ आतून कोरडी राहतात. इतकेच नव्हे तर कारखान्याचा धूर जसा धुराड्यामार्फत उंचावर सोडला जातो त्याचप्रमाणे वारुळातील उष्णता या ढिगाऱ्यामुळे हवेत सोडली जाते. वर्षभर मिळेल तितके धान्य, अन्नकण वेचून मुंग्या वारुळात नेऊन धान्य कोठारात साठवतात आणि नडीआडीला हे धान्य वापरतात. माणूस जसे घराची साफसफाई करून घर स्वच्छ ठेवतो तसेच मुंग्याही आपल्या कोठारांची साफसफाई करतात. कचरा, निरुपयोगी धान्याचे कण, मेलेल्या कीटकांचे अवशेष त्या वारुळाबाहेर आणून टाकतात. कणसात दाणे भरले की पाखरे कणसांवर तुटून पडतात. पाखरांच्या चोचीतून खाली पडलेले असे धान्य तसेच खळ्यात पडलेले धान्य, मळणी करताना इकडे तिकडे पडलेले धान्य- बाजरी, ज्वारी, गहू मुंग्या वारुळात नेतात. सुगीचा काळ हा मुंगीपासून जनावरे, माणसे सर्वांनाच आनंददायी असतो. वेगवेगळ्या मुंग्यांची वारुळे वेगवेगळी असतात. मुंग्यांच्या जिद्दीचा अनुभव मी बरेचदा बघितला. रस्त्याच्या कडेला एकदा मुंग्यांनी वारूळ खोदायला सुरुवात केली. थोडीफार जमीन भुसभुशीत होताच मोठा पाऊस आला आणि वारूळ मुजुन गेले. मला वाटलं मुंग्या आता दुसरीकडे वारूळ करतील पण दुसऱ्या दिवशी पाऊस उघडल्यानंतर त्याच जागेला वारूळ खोदायला सुरुवात केली. बरेचदा एखाद्या प्राण्याने किंवा किटकाने त्यांच्यावर हल्ला केला की एकजुटीने त्या शत्रूस कडकडून चावतात अगदी सापाला सुद्धा!

वाळव्याची सुद्धा वारुळे असतात. असे म्हणतात की वारुळाच्या साहाय्याने भूगर्भातील पाणी शोधण्यास मदत होते. तसेच वारुळाच्या मातीचा औषधासाठी, शेतीतील उत्पादनवाढीसाठी होतो म्हणून शेतकऱ्यांना वारुळे फायद्याची असतात. गांडूळे जशी जमीन भुसभुशीत करतात तसेच मुंग्यासुद्धा जमीन भुसभुशीत करायचे काम करतात. मुंग्या माती फिरवतात आणि वायू देतात ज्यामुळे पाणी आणि ऑक्सिजन वनस्पतींच्या मुळांपर्यंत पोहोचू शकतात. मुंग्या बियांचा भाग असलेल्या पौष्टिक इलिओसोम्स खाण्यासाठी त्यांच्या बोगद्यात बिया घेतात. या बिया अनेकदा उगवतात आणि नवीन रोपे वाढतात, पसरतात यासाठीच वारुळांचे संवर्धन केले जाते. आतमध्ये वारूळ जितकी खोल तितकेच उंच वर आणलेले मातीचे निमुळते ढिगारे असतात. एक मीटर ते पाच-सहा मीटर पर्यंत त्यांची उंची असते. हिरवाईत लपलेले एखादे उंच वारूळ लांबून एखाद्या मंदिराप्रमाणे किंवा पर्वताच्या सुळक्यासारखे सुंदर दिसते. इयत्ता सातवीत आम्हाला बालभारतीमध्ये कवी श्रीकृष्ण पोवळे यांची ‘वारूळ’ नावाची अतिशय सुंदर कविता होती. त्यात कवीने वारुळाला हीच उपमा दिली आहे.

 वारूळ वारूळ मुंग्यांचे वारूळ

 कृमी कीटकांनी बांधले देऊळ

 शेतकऱ्यांच्या जीवनात असलेले वारुळांचे महत्व आता शेतकरीच विसरू लागले आहेत. कधी साप, नाग पकडण्यासाठी तर कधी अंधश्रध्दापायी तर कधी शेतीचे क्षेत्र कमी होईल म्हणून वारूळ खोदून नष्ट केली जात आहेत. लहानपणी आम्हाला बाई वारुळाची पूजा करायला नेत असत. सोबत आणलेल्या लाह्या वारुळावर विस्कटायला लावत. त्यावेळी तो फक्त उपचार वाटत होता पण आज त्यामागील उपयुक्तता व सहसंबंध लक्षात येतो. जुनाट, कालबाह्य, निरुद्धेश्य रूढी म्हणून आपण चांगल्या गोष्टी, परंपरांचा त्याग करत आहोत, निसर्गाचा ऱ्हास करत आहोत पण निसर्ग आणि माणूस परस्परावलंबी आहेत. निसर्गाचा ऱ्हास हाच मानवाच्या विनाशाचे कारण ठरत आहे पण माणूस कधी डोळे उघडणार?

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘ढालगज भवानी’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘ढालगज भवानी’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर ☆

ढाल म्हणजे ढाल आणि गज म्हणजे हत्ती अशी या शब्दाची फोड.

युद्धाच्या मैदानात अगदी पुढे जो ढालीसारखा शत्रूच्या सैन्याला सामना करणारा पहिल्या फळीतला हत्ती हा ढालगज असे.

या हत्तीवर राजचिन्हे, वस्त्रे सजवलेली असत आणि ध्वज घेऊन एक दोन सैनिकांना बसवले जायचे. त्यांचे काम ध्वज फडकवत ठेवणे आणि पुढे पुढे चाल करत राहणे हे असे. , ढालगजावरून ध्वज खाली उतरला कि मागच्या सैनिकांना पराभवाचा संदेश मिळे.

या ढालगजाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या हत्तीच्या गंडस्थळावर एक मोठी ढाल बांधलेली असायची. पूर्वीच्या काळी किल्ले, राजवाडे यांच्या मुख्य द्वाराला ते कोणी तोडू नयेत म्हणून मोठे अणकुचीदार सुळे लावलेले असत. असे द्वार कपाळाला ढाल बांधलेला ढालगज हत्ती धडका देऊन तोडून टाके आणि किल्ल्याचा विजय सुकर करे. म्हणूनच ढालगज हत्तीला सैन्यात सर्वात जास्त महत्व असे.

जशी युद्धासाठी घोड्यांचे परीक्षण केले जायचे त्याच प्रमाणे ढालगज निवडण्यासाठी हत्तींचेही परीक्षण होत असे. पहिल्या फळीतला ढालगज होणे म्हणजे काही सोपे काम नव्हते. हा हत्ती चपळ, निडर आणि हुशार असायला हवा. तोफेच्या तसेच बंदुकांच्या आवाजाला न घाबरता पुढे चालत राहण्यासाठी त्याला विशिष्ट परीक्षेतून जायला लागायचे.

पूर्वी मराठ्यांनी जेवढी युद्धे जिंकली, त्यात जसे घोडे आणि सैनिकांचे पराक्रम आहेत तसेच या ढालगजांचे देखील आहेत.

मग ढालगज भवानी कोण?

भवानी ही पेशव्यांची ढालगज होती. आणि तिने केलेल्या पराक्रमांवरून तिचे नाव आपल्या बोली भाषेत ‘ भांडणाची खुमखुमी असलेल्या ‘ बायकांसाठी फेमस झाले. इतिहासात नोंद आहे कि भवानी हत्तीणीने पेशव्यांच्या सैन्यात खूप वर्षे ढालगजाचे काम केले आणि तिचा दबदबा खूप होता.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ समुद्राशी झुंजलेला ‘स्वर्गीय’ जल-सैनिक ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

समुद्राशी झुंजलेला ‘स्वर्गीय’ जल-सैनिक ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

पंचमहाभूतांपैकी पाणी आणि त्यातून सागराचे पाणी हे प्रचंड शक्तिशाली असते. सागराची भव्यता, त्यात उठणारी वादळे, महाकाय लाटा यांच्याशी मानवाला सामना करता येणे अतिशय कठीण. पण आपल्या सीमांचे रक्षण कायचे असेल तर जमीन, आकाश आणि जल आणि हल्ली अवकाश या चारही ठिकाणी सैनिकांना सज्ज ठेवावे लागते. आपल्याकडे युद्धनौका तर आहेतच पण आपल्या पाणबुड्या आणि त्यातील सैनिक हे जगातल्या नौसैनिकांतले उत्तम नौसैनिक म्हणून गणले जातात. पण पायदळ आणि वायुदल यांमधील सैनिकांच्या शौर्यकथा सामान्य जनतेला ब-यापैकी ठाऊक असतात, पण पाण्यात राहून शत्रूची वैर करणा-या आणि त्या शत्रूंना रोखून धारणा-या नौसैनिक, नाविक अधिकारी यांच्या पराक्रमाची महती काहीशी कमी असते. आज अशाच एका नौदल अधिका-याच्या असीम पराक्रमाची गाथा सादर करतो आहे.

समुद्रात पाणबुडीमध्ये काम करणे हे अत्यंत जिकीरीचे, हिमतीचे आणि धैर्याचे काम. या कामांत शत्रूकडून आणि प्रत्यक्ष समुद्राकडून सैनिकांच्या जीवाला सतत धोका असतोच असतो. १५ ऑक्टोबर, १९७४ रोजी अहमदाबादेत दराबाशा आणि आरमीन मोगल यांच्या पोटी जन्मलेले फिरदौस हे देशसेवेसाठी १९९२ मध्ये खडकवासल्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन. डी. ए. ) मध्ये प्रशिक्षणार्थी सैन्याधिकारी म्हणून दाखल झाले. मूळचे अतिशय धाडसी, बुद्धीमान असलेल्या फिरदौस यांनी पाणबुडी युद्धनौकेवर सेवा करण्याचा मार्ग निवडला. १ जानेवारी १९९८ रोजी त्यांनी नौदलात प्रवेश केला.

स्वयंस्फूर्तीने कार्यरत असलेले फिरदौस यांनी प्रथमपासूनच कामात चमक दाखवली. पाणबुडीत काम करण्यासाठीचा प्रशिक्षण अभ्यासक्रम त्यांनी उत्कृष्ट गुण मिळवून पूर्ण केला. आय. एन. एस. (इंडियन नेवल शिप) शाल्की वर त्यांनी पाणबुडी विरोधी युद्ध अधिकारी पद मिळवले. आय. एन. एस. विशाखापट्टनम, आय. एन. एस. सातवाहन यावर त्यांनी सेवा बजावली. आय. एन. एस. शंकुश ते मुख्य अधिकारी बनण्याचा मान मिळवला. त्यांच्या युद्ध कौशल्याचे वरिष्ठ अधिका-यांना मोठे कौतुक असे.

२९ मे, २०१० रोजी लेफ्टनंट कमांडर फिरदौस साहेबांनी आय. एन. एस. शंकुश वर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार सांभाळला. आय. एन. एस. शंकुश ऑगस्ट महिन्यात फ्रेंच नौदल आणि भारतीय नौदल यांच्या संयुक्त विद्यमाने युद्धसराव सत्रात सहभागी होती. २९ ऑगस्ट रोजी या पाणबुडीमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने तातडीने दुरुस्ती करणे भाग होते. यासाठी ही पाणबुडी मुंबईच्या समुद्रात पाण्याच्या पृष्ठभागावर आणली गेली. ३० ऑगस्ट, २०१० रोजी सकाळी सात वाजताच्या दरम्यान दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. तीन नौसैनिक आणि एक इंजिनियरिंग अधिकारी असे चार जण या अवघड कामगिरीवर नेमले गेले. पाणबुडीच्या बाह्याभागावर असलेल्या केसिंग वर हे चौघे उतरलेले असतानाच अचानक समुद्रात एक प्रचंड लाट उसळली आणि दोन नौसैनिक आणि इंजिनियरिंग अधिकारी पाण्यात फेकले गेले. तिसरा नौसैनिक पाणबुडीच्या केसिंगवर लटकत राहिलेला होता.. आणि तो कधीही पाण्यात पडू शकत होता. फिरदौस क्षणाचाही विलंब न लावता स्वत: उफाणत्या दर्यात उडी घेतली. लटकत राहिलेल्या नौसैनिकाचा पाय जायबंदी झालेला होता. साहेब केसिंगवर चढले आणि स्वत;च्या जीवाची पर्वा न करता त्या सैनिकाला खालून ढकलून आपल्या खांद्यावर घेतले आणि शिडीवरून चढून जात त्याला पाणबुडीच्या ब्रिज वर चढवले. ही शिडीही पाण्यात निम्मी बुडालेली होती. लाटांचा मारा सुरु होता. समुद्र आणि साहेब यांच्यात वीस मिनिटांचा संघर्ष सुरु होता. यासाठी खूप शारीरिक शक्ती आणि मोठी हिम्मत लागते. पाण्यात पडलेले इतर सैनिक साहेबांकडे आशेने पाहू लागले होते… फिरदौस साहेब पुन्हा पाण्यात झेप घेते झाले. तोपर्यंत नेव्ही डायवर्स (पाणबुडे) समुद्रात उतरले होते. साहेबांनी या डायवर्सना मदत करायला आरंभ केला. सर्वांनी मिळून पाण्यात पडलेल्या सैनिकांना एकत्रितपणे पाणबुडीजवळ ढकलण्यात यश मिळवले. या सर्वांचा एक गट एकत्रितपणे पाणबुडीवर चढण्याचा प्रयत्न करू लागला… तुफानी लाटा होत्याच.. त्यांना समुद्रात ओढणा-या. सर्वजण पाणबुडीवर चढण्याच्या अगदी बेतात असताना एक अजस्र लाट आली आणि साहेब आणि इतर सर्व पुन्हा पाण्यात खेचले गेले. साहेबांनी पुन्हा जोर लावला…. पाणबुडीजवळ पोहोचले… आपल्या खांद्यावर एकेकाला घेतले आणि वर ढकलत राहिले… समुद्र आता पुरता खवळला होता… साहेब म्हणाले… तुम्ही सर्व वर पोहोचल्याशिवाय मी वर येणार नाही…. तसेच झाले… इतर सर्व सुरक्षितरित्या पाणबुडीवर पोहोचले… पण साहेब खालीच राहिले… आणखी एका मोठ्या लाटेने साहेब पाणबुडीवर आदळले.. त्यांच्या डोक्याला जबर मार बसला… तरीही साहेब तरंगत राहिले… पोहत राहिले. तोपर्यंत Helicopter ची मदत बोलावण्यात आली होती. नौसेनेच्या helicopter ने साहेबांना पाण्यातून उचलून घेतले आणि तातडीने आय. एन. एस. अश्विनी जहाजावर वैद्यकीय उपचारास नेले.. पण तो पर्यंत समुद्राने आपला डाव साधला होता…. त्याच्या लाटांशी प्राणपणाने झुंज देणारा हा वीर त्याने पराभूत केला होता… आणि नंतर त्याची त्यालाच शरम वाटली असावी… कारण काहीच वेळात समुद्र गप्प गप्प झाला… जणू काही झालेच नव्हते! सहा सैनिकांचे प्राण वाचवून लेफ्टनंट कमांडर फिरदौस दराबशाह मोगल साहेब स्वर्गात पोहोचले… फिरदौस म्हणजे स्वर्ग! एक स्वर्ग दुस-या स्वर्गात गेला…. सैनिक जिंकले तर भूमीचा भोग घेतात आणि धारातीर्थी पडले तर स्वर्गाची प्राप्ती होते त्यांना! 

हे असामान्य कामगिरी होती. एकवेळ जमीन, आकाश येथे माणसाचा निभाव लागू शकेल.. पण पाण्यात? अतिशय अवघड काम असते. तेच काम साहेबांनी करून दाखवले… आणि हुतात्मा झाले. वादळ प्रभावित जनतेला साहाय्य करण्यात साहेब सतत पुढे असत. माणसातील हिरा असे त्यांचे वर्णन त्यांचे सहकारी करीत.

In grey cold waves, when he went too far…. Strength of his spirit was the weapon of his war! अर्थात त्यांच्या आत्म्याची शक्ती हेच त्यांचे युद्धातील आयुध होते… जे त्यांनी प्राणपणाने चालवले आणि अमर झाले! मरणोत्तर शौर्य चक्राने देशाने साहेबांना सन्मानित केले… आंपण एक रत्न गमावले! ही कथा खरं तर सर्वांना माहीत असायला हवी होती… आता तरी इतरांना सांगा. हे आपले नायक… हे आपले भाग्यविधाते… हे आपले संरक्षक. यांच्या पराक्रमाच्या गाथा सतत गायल्या गेल्या पाहिजेत… जय हिंद. 🇮🇳

अहमदाबाद मधील एक रस्त्याला साहेबांचे नाव दिले गेले आहे.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रवींद्रनाथ टागोर आणि ‘वाल्मिकी प्रतिभा’ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

रवींद्रनाथ टागोर आणि ‘वाल्मिकी प्रतिभा’ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

इंग्लंडमधून भारतात परत आल्यावर रवींद्रनाथांनी ‘ वाल्मिकी प्रतिभा ‘ या नावाचे एक नाटक लिहिले. या वेळी त्यांचे वय अवघे वीस वर्षांचे होते. रवींद्रनाथांना नाट्य, संगीत आणि काव्यलेखनाचे बाळकडू त्यांच्या घरातच अगदी लहानपणापासून मिळाले होते. त्यांचे भाऊ ज्योतिरिंद्रनाथ नाटके लिहीत आणि बसवत असत. गुणिंद्रनाथ म्हणून त्यांच्या एका चुलतभावाला पण नाटकांची आवड होती. ज्योतिदांनी रवींद्रनाथांना नेहमीच उत्तेजन दिले. त्यामुळे रवींद्रनाथांची प्रतिभा साहित्यक्षेत्रात मुक्तपणे संचार करू लागली होती.

‘वाल्मिकी प्रतिभा’ हे नाटक अनेक अर्थांनी आगळेवेगळे आहे. वाल्या कोळी वाल्मिकी ऋषी होण्याआधी एक दरोडेखोर होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ब्रह्मदेव आणि नारदांच्या आज्ञेनुसार त्यांनी ‘ रामायणाची ‘ रचना केली. परंतु ही रचना करण्याआधी त्यांनी क्रौंच पक्षाचे एक जोडपे एका झाडावर बसलेले पाहिले. त्या आपल्या आनंदात निमग्न असणाऱ्या एका पक्ष्याला एका शिकाऱ्याने बाण मारला. त्यामुळे त्या दुसऱ्या पक्ष्याचा विलाप पाहून वाल्मिकींचे हृदय द्रवले आणि त्यांच्या तोंडून रामायणातील तो प्रसिद्ध श्लोक बाहेर पडला.

मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः ।

यत्क्रौंचमिथुनादेकमवधी काममोहितम् ।।

कधी नव्हे तो आपल्या तोंडून अशा प्रकारची सुंदर रचना कशी काय बाहेर पडली याचे त्यांना नवल वाटले. त्यानंतर त्यांनी ब्रम्हदेव आणि नारदांच्या आशीर्वादाने रामायणाची रचना केली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ही जी मूळ घटना आहे, ती रवींद्रनाथांना मान्य होती. पण आपल्या नाटकात त्या घटनेला त्यांनी वेगळीच कलाटणी दिली.

त्यांच्या ‘ वाल्मिकी प्रतिभा ‘ या नाटकात वाल्या आणि त्याचे साथीदार यांची दरोडेखोरांची एक टोळी असते. ही सगळी मंडळी अत्यंत क्रूर आणि आडदांड असतात. ते प्रतिभा नावाच्या एका निरागस मुलीला पकडून आणतात आणि कालीमातेपुढे तिचा बळी देण्याचं ठरवतात. या निष्पाप मुलीचा आक्रोश ऐकून वाल्याचे हृदय द्रवते. तो आपल्या साथीदारांशी वैर पत्करून तिची सुटका करतो. टोळीतील सहकाऱ्यांना सोडून देऊन तिला घेऊन रानोमाळ भटकतो. त्यातूनच त्याचे हृदयपरिवर्तन होते. तो स्वतः विषयी विचार करू लागतो. अंतरात्म्याचा शोध घेतो. त्याची ही तळमळ पाहून ती मुलगी म्हणजे प्रतिभा आपल्या खऱ्या रूपात त्याच्यासमोर प्रकट होते.

ती म्हणजे प्रत्यक्ष साहित्य, कला आणि विद्येची देवता सरस्वती असते. ती त्याला म्हणते, ‘ तुझ्यातील माणुसकी जागृत होते की नाही याची परीक्षा मी पाहिली. त्यासाठी मीच बालिकेचे रूप घेतले होते. तुझ्या पाषाणहृदयाला ज्या आर्त करुणेच्या स्वरांमुळे पाझर फुटला, त्याच तुझ्या हृदयातून आणि वाणीतून आता माणुसकीचे संगीत जन्म घेईल आणि लक्षावधी मनांना कोमल भावनांनी शुद्ध करेल. तुझी वाणी देशोदेशी चिरकाल घुमत राहील आणि त्यातून अनेक कवींना प्रेरणा मिळेल. ‘ 

या नाटकात रवींद्रनाथांनी वाल्या कोळी लुटारूंपासून सरस्वतीला मुक्त करतो हे जे दाखवले आहे, प्रतिकात्मक आणि अतिशय महत्वाचे आहे. त्याचा अर्थ असा की ‘ सरस्वती ‘ आज साहित्यरूपाने लुटारुंच्या, धनदांडग्यांच्या ताब्यात आहे. तिला त्यांच्यापासून मुक्त केले पाहिजे. समाजाला बळ देणारे साहित्य आणि एकूणच साहित्य आणि कलाक्षेत्र हे साहित्यिक आणि कलावंतांच्याच ताब्यात असले पाहिजे. राजकारणी, धनदांडगे यांच्यापासून ते मुक्त असले पाहिजे. तरच ते सर्वसामान्यांना उपयुक्त ठरेल. समाजाच्या प्रगतीची दिशा त्यामुळे सापडू शकेल. साहित्यिकांना मोकळे आकाश मिळेल. रवींद्रनाथांनी त्याकाळी जे प्रतीकात्मक रूपाने सुचवले ते आजदेखील तेवढेच महत्वाचे आहे.

या नाटकाने रवींद्रनाथांनी जणू प्रायोगिक रंगभूमीची पायाभरणी केली. अनेक गोष्टी नवीन आणल्या. नाटकांवर इंग्रजी नाट्यभूमीचा प्रभाव होता, संगीताचा आणि रागदारीचा प्रभाव होता, त्या चौकटीतून नाटकाला बाहेर काढण्याचाच त्यांचा हा प्रयत्न होता. त्यांचे हे नाटक म्हणजे सुरांचा आणि स्वरांचा अविष्कार होता. त्याला एक प्रकारची आंतरिक लय होती. गाण्याच्या आणि रागदारीच्या बंधनांपासून काही अंशी मुक्त होत आपल्याला हवा तसा नाट्याविष्कार सादर करण्याचे आणि स्वरांच्या प्रकटीकरणाचे स्वातंत्र्य त्यांनी घेतले होते. ते नुकतेच इंग्लंडहून परतल्यामुळे या त्यांच्या प्रायोगिक नाटकावर काही अंशी पाश्चात्य संगीत आणि आयरिश संगीताचा प्रभावही होताच. हे नाटक केवळ वाचण्यासाठी नव्हेतच तर ते पाहावे आणि अनुभवावे अशा प्रकारचे होते. या नाटकाने वयाच्या केवळ विसाव्या वर्षी रवींद्रनाथांचे नाटककार म्हणून दमदार पदार्पण झाले.

या नाटकातून साहित्यिक म्हणून आपल्या पुढील प्रवासाची दिशा रवींद्रनाथांना गवसली. आपले पुढील साहित्य कसे असेल याची जणू झलकच त्यांनी या नाटकाद्वारे दाखवली. दरोडेखोरांच्या किंवा धनदांडग्यांच्या तावडीतून सरस्वतीला मुक्त केल्याशिवाय कलावंताला सरस्वती प्रसन्न होत नाही हे त्यांना जाणवले होते. वाल्मीकींच्या अंतःकरणात जो दयेचा, करुणेचा झरा वाहू लागला, त्यामुळे जगाकडे आणि त्यातील क्रौर्याकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी वाल्मिकींना प्राप्त झाली. बालिकेला दरोडेखोरांच्या तावडीतून सोडवणे म्हणजेच सरस्वतीला नको असलेल्या व्यक्तींच्या ताब्यातून मुक्त करणे आवश्यक आहे हे त्यांच्या लक्षात आले. ‘ वाल्मिकी प्रतिभा ‘ हे नावच खरोखर अगदी सुंदर आहे. त्याच्या नावातच रवींद्रनाथ यांच्या प्रतिभेचाही विलास आपल्याला दिसतो. त्यांच्या प्रतिभेची झेप आपल्याला दिसते.

या नाटकात वाल्मिकींची भूमिका स्वतः रवींद्रनाथांनी केली तर सरस्वतीची भूमिका त्यांची एक भाची प्रतिभा म्हणून होती तिने केली. त्या काळात नाटकात किंवा रंगभूमीवर आपल्या घरातील मुलींना सनातनी विचारांचे लोक पाऊल ठेवू देत नसत. असे करणे म्हणजे प्रतिष्ठेला बाधा आणण्यासारखे होते. पण रवींद्रनाथांनी ही सुरुवात स्वतःच्या घरापासूनच केली. ही एक प्रकारची सामाजिक क्रांतीच होती. त्याची किंमतही टागोर कुटुंबीयांना मोजावी लागली पण त्याची त्यांना पर्वा नव्हती. स्त्रियांना देखील कला, साहित्य, शिक्षण इ. क्षेत्रात मुक्त आकाश मिळाले पाहिजे असेच त्यांना वाटत होते. या नाटकात खरं तर त्यांच्या घरातील बहुतेक सदस्यांचा या ना त्या कारणाने सहभाग होता. हे नाटक पहिल्यांदा सादर झाले ते सुद्धा टागोर कुटुंबियांच्या जोराशंको वाडी इथेच ! कला, साहित्य इ प्रांतात पुढील काळात रवींद्रनाथांची जी वाटचाल होणार होती, त्याची सुरुवात आणि दिशादर्शन करणारे नाटक म्हणजे ‘ वाल्मिकी प्रतिभा ! ‘

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ महात्मा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? इंद्रधनुष्य ?

☆ महात्मा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

भली मोठी पांढरी शुभ्र मरसिडीज, दूरदृष्टी महाराजांच्या बंड गार्डन रोडवरील राजवाड्या सदृश मठाच्या दारात थांबली. शोफरने धावत येवून दार उघडलं. आतून पांढऱ्या शुभ्र कपड्यातील एक खानदानी व्यक्ती अंगावरच्या श्रीमंतीच्या सगळ्या खुणा दाखवत उतरली. दूरदृष्टी महाराजांचे रोजचे प्रवचन, देशी विदेशी भक्तांच्या भरगच्च दरबारात चालू होते. ती व्यक्ती अदबीनं महाराजांच्या पाया पडली. रोजच्या प्रमाणे खिशातून पाचशेच्या नोटांची दोन कोरी बंडल्स काढली आणि महाराजांच्या पायाशी ठेवली. थोडावेळ खाली बसून प्रवचनाचा लाभ घेऊन, परत नमस्कार करून मठाच्या बाहेर पडून गाडीतून निघून गेली. एक महिनाभर हा प्रकार रोज सलग चालल्यावर, एक दिवस ती व्यक्ती बाहेर पडताच, महाराजांनी त्यांच्या सुखदेव नावाच्या खास शिष्याला खूण केली.

“महाराज त्यांचे नांव अनिरुद्ध महात्मे. पुण्यात ‘पुण्यात्मा’ नावाची त्यांची स्वतःची IT फर्म आहे. ” “अस्स, उद्या त्यांची आणि माझी भेट माझ्या खाजगी दालनात अरेंज करा.”

“नमस्कार महाराज, काय सेवा करू?” “नमस्कार महात्मे! आम्ही बघतोय, गेले महिनाभर तुम्ही आमच्या समोर रोज पाचशेच्या नोटांची कोरी बंडल्स……… ” “महाराज, गत आयुष्यात केलेल्या पापांच थोड तरी परिमार्जन व्हावे या एकाच हेतूने हे मी करतोय!” “नाही पण तुमच्या IT business मध्ये इतका पैसा ?” “महाराज, आपल्या पासून काय लपवणार आपल्याकडची बडी मंडळी आणि अनेक उद्योगपती यांची स्विस बँकेतली खाती मी मेन्टेन करतोय महाराज! तो पण माझा एक business च आहे, पण तो उघडपणे….. ” “समजलं महात्मे ! आमच्याकडे सुद्धा आमच्या फॉरीनच्या शिष्यानी दिलेली अनेक चलनातली अगणित रोख रक्कम…… ” “कळलं महाराज, आपण चिंता करू नका, फक्त आज्ञा द्या !” “महात्मे, उद्या सकाळी मला इथेच भेटा आणि ‘त्या’ सगळ्याची व्यवस्था स्विस बँकेत कशी लावता येईल ते पहा!” “जरूर महाराज ! उद्या सकाळी हा बंदा सेवेला हजर असेल !”

“सुखदेव, गेला आठवडाभर महात्मेची रोजची भेट बंद झाल्ये. ” “होय महाराज” “सुखदेव, त्यांचा काही निरोप ?” “काहीच नाही महाराज. ” “ठीक आहे. उद्या त्यांच्या IT फर्मला भेट द्या. ” “होय महाराज. “

“महाराज त्यांच्या फर्मला टाळं आहे. ” “काय ssss ?” “होय महाराज, अनिरुद्ध महात्मेनी फर्मची ती जागा तीन महिन्यासाठी भाड्याने घेतली होती, असं चौकशी करता कळलं. “

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares