मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ११ — विश्वरूपदर्शनयोग — (श्लोक ४१ ते ५५) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ११ — विश्वरूपदर्शनयोग — (श्लोक ४१ ते ५५) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति।

अजानता महिमानं तवेदंमया प्रमादात्प्रणयेन वापि ॥४१॥

*

यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु ।

एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षंतत्क्षामये त्वामहमप्रमेयम्‌ ॥४२॥

*

तव महानता नव्हतो जाणुन प्रमाद घसटीचा

यादवा हे कृष्ण सख्या अजाणता संबोधण्याचा

विनोद विहार शय्या मजसंगे केलीत मायेने

अनमान जाहला माझ्याकडुनी उद्धरा क्षमेने ॥४१,४२॥

*

पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान्‌।

न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्योलोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभाव ॥४३॥

*

जगत्पित्या हे महाजगद्गुरो देवा पूजनीय अनुपम 

त्रैलोक्यी श्रेष्ठ वा नाही कोणी प्रभावी तुमच्या सम ॥४३॥

*

तस्मात्प्रणम्य प्रणिधाय कायंप्रसादये त्वामहमीशमीड्यम्‌।

पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियः प्रियायार्हसि देव सोढुम्‌॥४४॥

*

प्रसन्न व्हावे क्षमा करावी जगदीश तव  चरणी देहार्पण

पिता पुत्राचा सखा सखीचा जैसे करीत अपराध सहन ॥४४॥

*

अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे।

तदेव मे दर्शय देवरूपंप्रसीद देवेश जगन्निवास ॥४५॥

*

कधी न देखीले तुमच्या या विराटस्वरूप दर्शने

हर्षनिर्भर मनोमनी तैसा व्याकुळ झालो भयाने

जगदीशा परमेशा घ्या आवरून विश्वरूपाला 

प्रसन्न व्हा चतुर्भुज विष्णुरूप दर्शन द्या मजला ॥४५॥

*

किरीटिनं गदिनं चक्रहस्तमिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव।

तेनैव रूपेण चतुर्भुजेनसहस्रबाहो भव विश्वमूर्ते॥४६॥

*

शिरावरी किरीट हाती गदा तथा चक्र हेच रूप दावा

विश्वस्वरूपा सहस्रबाहो मजला चतुर्भुज रूप दावा ॥४६॥

श्रीभगवानुवाच

मया प्रसन्नेन तवार्जुनेदंरूपं परं दर्शितमात्मयोगात्‌ ।

तेजोमयं विश्वमनन्तमाद्यंयन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम्‌ ॥४७॥

कथित श्रीभगवान

प्रसन्न होउनी तुजवर पार्था तुज दिधले दर्शन 

अनादिअंत परम तेजोमय योगशक्तीचे प्रमाण

तुझ्या आधी ना कधी पाहिले कोणी या रूपाला

करुनी तुझिया वरी अनुग्रह दाविले विराट रूपाला ॥४७॥ 

*

न वेदयज्ञाध्ययनैर्न दानैर्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः।

एवं रूपः शक्य अहं नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरुप्रवीर ॥४८॥

*

दानाने ना वेदाध्ययनाने कर्माने ना उग्र तपाने

विश्वरूप हे माझे पार्था कुणा ना गोचर अन्य कशाने ॥४८॥

*

मा ते व्यथा मा च विमूढभावोदृष्ट्वा रूपं घोरमीदृङ्‍ममेदम्‌।

व्यतेपभीः प्रीतमनाः पुनस्त्वंतदेव मे रूपमिदं प्रपश्य ॥४९॥

*

नकोस होऊ व्याकूळ ना होई बुद्धीभ्रष्ट विक्राळ रूपाने

त्यागुनिया भय प्रीतीने तुष्ट होई चतुर्भुज माझ्या रूपाने ॥४९॥

संजय उवाच

इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः ।

आश्वासयामास च भीतमेनंभूत्वा पुनः सौम्यवपुर्महात्मा ॥५०॥

कथित संजय

कथूनी ऐसे  वासुदेवे दाविले चतुर्भुज रूप अर्जुनासी

पुनरपि होउनी सौम्यस्वरूपी धैर्य दिधले कौन्तेयासी ॥५०॥

अर्जुन उवाच

दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन।

इदानीमस्मि संवृत्तः सचेताः प्रकृतिं गतः॥५१॥

कथित अर्जुन 

दर्शनाने तव सौम्यस्वरूपी मानवी हे जनार्दना

चित्ता लाभले स्थैर्य माझिया स्वाभाविकता मन्मना॥५१॥

श्रीभगवानुवाच

सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम।

देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्‍क्षिणः॥५२॥

कथित श्रीभगवान 

दर्शन झाले तुजला पार्था सुदर्शनधारी चतुर्भुज रूपाचे

देवदेवता दर्शनाकांक्षी दुर्लभ सहजी ना कुणा व्हायचे ॥५२॥

*

नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्यया।

शक्य एवं विधो द्रष्टुं दृष्ट्वानसि मां यथा ॥५३॥

*

तुला जाहले दिव्य दर्शन चतुर्भुज या रूपाचे

वेद तप वा दान यज्ञे दृष्टी गोचर नच व्हायाचे ॥५३॥

*

भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवंविधोऽर्जुन ।

ज्ञातुं द्रष्टुं च तत्वेन प्रवेष्टुं च परन्तप ॥५४॥

*

भक्तीनेच केवळ अनन्य परन्तपा साध्य चतुर्भुज दर्शन 

ज्ञान तयाचे प्रवेश तयात  होई तयाने अद्वैताचे दिव्य ज्ञान ॥५४॥

*

मत्कर्मकृन्मत्परमो मद्भक्तः सङ्‍गवर्जितः ।

निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव ॥५५॥

*

कर्म समर्पित माझ्या ठायी माझ्या चरणी लीन

मोहाचा ना सङ्ग जयाला मम भक्तीने परिपूर्ण 

चराचरांप्रति वैरभाव ना सौहार्दाने जो युक्त

अनन्यभक्तीयुक्त अर्जुना तयासि मी होतो प्राप्त ॥५५॥

*

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायांयोगशास्त्रे 

श्रीकृष्णार्जुनसंवादे विश्वरूपदर्शनयोगो नामैकादशोऽध्यायः ॥११॥

 

ॐ श्रीमद्भगवद्गीताउपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादरूपी विश्वरूपदर्शनयोग नामे निशिकान्त भावानुवादित एकादशोऽध्याय संपूर्ण ॥११॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘ढिंचणिया’ — लेखक : मकरंद करंदीकर ☆ श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

 

 ‘ढिंचणिया’ — लेखक : मकरंद करंदीकर ☆ श्री सुनीत मुळे ☆

मांडी घालून जेवतांना अजब टेकू –…!!

भारतात पूर्वींपासून चालत आलेल्या भोजन पद्धती आणि जेवणासाठी वापरली जाणारी  वैशिष्ट्यपूर्ण भांडी, स्वयंपाकघरातील वेगळ्या वस्तू आणि अनेक प्रथा, आताशा लुप्त होत चालल्या आहेत. जमिनीवर मांडी घालून बसणे हा एक सर्वमान्य, सार्वकालिक अस्सल भारतीय प्रकार ..!! म्हणूनच आपण तिला ‘भारतीय बैठक’ म्हणतो ..!! 

मांडी घातल्यावर दोन्ही पावले, गुडघ्यांच्या खाली अशा तऱ्हेने घेतली जायची की त्यामुळे, दोन्हीही मांड्यांना आधार मिळत असे. हा सगळा इतका मोठा व्यायाम होता की ज्यामुळे सांधेदुखी, कंबरदुखी,गुडघ्यातील वेदना, ‘नी रिप्लेसमेंट’ असल्या  गोष्टी लांब राहत असत. कांही अपवाद वगळता भोजनासाठी, न्याहारीसाठी जमिनीवर, पाटावर,आसनावर बसण्याची पद्धत होती ..!! 

खरेतर, माणसाच्या नाभी पासून गुडघ्यापर्यंतच्या शरीराचे सर्वाधिक वजन असते. जमिनीवर बसल्यानंतर, नाभीपासून डोक्यापर्यंतचे वजनही त्यावरच येते ..!! 

मांडी घालून बसल्यावर,अधिक स्थूल मंडळींची गंमतच होत असे. त्यांचे दोन्हीही गुडघे जमिनीपासून खूप वरती राहत असत. अशा टांगलेल्या  अवस्थेत जास्तवेळ जमिनीवर बसणे अशक्य होते. त्यावर शोधून काढलेली वस्तू म्हणजे ‘ढिंचणिया’ म्हणजे ढोपर टेकू ..!! 

जेवायला जमिनीवर मांडी घालून बसल्यावर, अधिक स्थूल मंडळींची गंमतच होत असे. त्यांचे दोन्ही गुढघे जमिनीपासून खूप वरती राहत असत. अशा टांगलेल्या अवस्थेत जास्त वेळ जमिनीवर बसणे अशक्य होते. अशा अवस्थेत राहणाऱ्या मांड्यांच्या खाली द्यायचा आधार म्हणजे ‘ढिंचणिया’ ..!! हा एक ढिंचणिया साधारणत: डमरूसारखा, ५ ते ७ इंच उंच आणि ३ ते ४ इंच रुंद इतक्या आकाराचा असे. दोन गुडघ्यांखाली घेण्यासाठी याची जोडी बनवली जात असे. याचा तळ समईच्या तळासारखा जाड आणि एकसंध असायचा. त्यामुळे ते पटकन उलटत नसे ..!! मांडीला टोचू नये म्हणून याचा वरचा भाग हा कडेने आणि वरून गोल गुळगुळीत असे. सर्वात महत्वाची गोष्ट अशी की वरचा अर्धा भाग हा नक्षीचा जाळीदार असायचा. बराच काळ मांडीखाली ठेवल्याने तो शरीराच्या उष्णतेने तापू नये म्हणून ही जाळी असे. हे पितळ आणि कांशापासून बनविले जात असत. तत्कालीन कारागिर त्यावर खूप चांगली नक्षी कोरत असत. तांबे आणि हस्तिदंतापासूनही हे  ढिंचणिया बनविले जात असत. लाकडापासून बनविलेले  ढिंचणिया हे स्वस्त असल्याने अधिक लोकप्रिय होते. त्यावरही अतिशय आकर्षक रंगांमध्ये सुंदर नक्षी रंगविलेली असे. गुजरात (विशेषतः सौराष्ट्र) आणि राजस्थान ह्या भागांमध्ये हे ढिंचणिया वापरले जात असत ..!! अगदी खेडेगावात जेथे ढिंचणिया उपलब्ध नसतील तेथे, एखादा धातूचा डबा, लाकडी ठोकळा, कापडाचा बोळा अशा वस्तूही वापरल्या जात असत ..!!  

आपण एक हस्तटेकूही पहिला असेल. आसनावर हातात जपमाळ घेऊन बसलेल्या संत रामदासस्वामी आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हाताखाली दिसणाऱ्या इंग्रजी टी आकाराच्या टेकूला कुबडी म्हणतात. ह्याच्या आत स्व-संरक्षणासाठी शस्त्रही लपविले जात असे ..!! 

शहरांमध्ये आता जमिनीवर बसणे कायमचे बाद होत चालले आहे. छोटी नगरे आणि खेडीही ‘मॉडर्न’ होत चालली आहेत. आता या ढिंचणियांची गरजच संपली आणि ते दृष्टीआड होता होता सृष्टीआडही होत आहेत ..!!  अजून निदान त्याचा वापर तरी माहिती आहे. कांही वर्षांनी बहुधा या ‘अज्ञात वस्तू’ म्हणून तेथे शिल्लक राहतील ..!! 

लेखक : मकरंद करंदीकर 

प्रस्तुती : सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जिवतीची पूजा ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे)

? इंद्रधनुष्य ?

☆ जिवतीची पूजा ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

श्रावण जवळ येत आहे , शहरांमध्ये हल्ली बहुतांश घरांमध्ये जिवती पूजन बंद झालेले दिसते, अनेकांना माहितीही नाही हे काय असते, त्यासाठी हा प्रपंच। 

जिवतीच्या प्रतिमेचे पुजन आणि त्याचा अर्थ. कोण हि जिवती? हिच्या पूजनाचा हेतू काय?

आषाढ महिन्याच्या अमावस्येला हे दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी जरा-जिवंतिका पूजन सुद्धा करतात.

दिवा हे ज्ञानाचं, वृधिंगततेच प्रतीक आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप. तुम्ही एक दिवा उजळा त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता त्यामुळेच याला वंश वृद्धीचं प्रतीक मानतात. या प्रतीकाचं पूजन म्हणजेच दीपपूजन दुसरी पूज्य देवता म्हणजे जिवती.

जिवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेच पूजन मातृशक्ती कडून केल्या जातं व आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या, वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते. यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही. काय रहस्य असेल या प्रतिमा क्रमाचे?

जिवती प्रतिमेत प्रथम नरसिंह, नंतर कालियामर्दन करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा- जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध – बृहस्पती (गुरु) यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पुजले जाते त्याची कारण मिमांसा…

प्रथम भगवान नरसिंहचं का?

भगवान विष्णूंचा चवथा अवतार असलेले नरसिंह, आपल्या बाळ भक्तासाठी प्रगट झाले. हि कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकशिपू पासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक आणि बाल भक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पुजले जातात.

म्हणजेच…

नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात जसे उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादी

त्यानंतर येतात कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण-

यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्हीपण श्रावणातील आराध्य दैवत. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन करणारा श्रीकृष्णच का? आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल कि या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळात असतांना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या- बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरटपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, त्याचबरोबर महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडत असतांना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पुजला जातो.

म्हणजेच…

कालियादमनक कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळतांना येणाऱ्या आपत्ती, पाण्यापासूनचे संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव करतात. घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्हीदेव बालकांचे रक्षण करतात म्हणून जिवती प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान.

नंतर येतात त्या जरा व जिवंतिका –

जरा व जिवंतिका या यक्ष गणातील देवता. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते. मगधनरेश बृह्दरथ याला दोन राण्या असतात. दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते. परंतु राजाला पुत्र/ पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतीत असतो. याच सुमारास नगरजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते. राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रगट करतो. ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो. कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा- अर्धा. अशा विचित्र आणि अर्धवट अभ्राकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोनीही शकलं सांधते. जरा ते सांधलेले अभ्रक संध्यासमयास बृह्दरथ राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंघ ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रीत्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मन देतो. त्याच प्रमाणे जारदेवतेचा वार्षिक महोत्सव सुरु करतो, अशी हि जरा देवी. जारेंचीच सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवतो अशा रूपात दाखवतात.

प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध व बृहस्पती –

बुध ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो. तर बृहस्पती (गुरु) वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, अध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते.

बुधाचं वाहन हत्ती – हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने, व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरुन लक्षात येते.

बृहस्पतीचं वाहन वाघ – हे अहंकाराचा प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो. अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या, गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते.

म्हणूनच बुध – बृहस्पती यांना सुद्धा जिवती प्रतिमेत स्थान मिळालं.

प्रथम रक्षक देवता.

नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता.

आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा हा जिवती प्रतिमेचा क्रम.

एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जिवती पूजन. जगातील सर्व प्राणिमात्रांच्या उज्वल भविष्याची, रक्षणाची प्रार्थना …म्हणजेच जिवती पुजन.  

तुम्हाला पूजण्याची ईच्छा असेल पण बाजारात जीवतीचा कागद मिळत नसेल तर याचाच प्रिंटआउट घ्या पूजन करा, गंध-पुष्प-धूप-दीप- दुधसाखरेचा नैवेद्य दाखवा. घरातील मुला बाळांना नमस्कार करायला सांगा त्यांना दुधसाखरेचे तीर्थ द्या व श्रावण संपल्यावर याचे विसर्जन करा (श्रावण अमावास्येला हा कागद उपडा करून ठेवायची व दुसऱ्या दिवशी विसर्जन करण्याची प्रथा आहे, श्रावणा नंतर मुलांना दिसता कामा नये).

कवी : म. ना. देशपांडे

(होरापंडीत मयुरेश देशपांडे)

+९१ ८९७५३ १२०५९ 

https://www.facebook.com/majhyaoli/ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ टिटवीची ‘टिवटिव’ – लेखक : श्री अनंत गद्रे ☆ प्रस्तुती – सुश्री जुईली केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ टिटवीची ‘टिवटिव’ – लेखक : श्री अनंत गद्रे ☆ प्रस्तुती – सुश्री जुईली केळकर ☆

गावखडीचे कासवमित्र डिंगणकर आंम्हाला तिथल्या सागरी कासवे संवर्धन मोहिमेची माहिती सांगत होते. 

ॲालिव्ह रिडले ही सागरी कासवांमधील आकाराने लहान असलेली कासवाची जात. जगभरच्या समुद्रांमधे आढळणारी ही कासवे. लहान म्हटली तरी ती दोन फुटा पर्यंत लांबी आणि पस्तीस ते चाळीस किलो वजनांची असतात. त्याच्या ॲालिव्ह करड्या रंगामुळे त्यांना हे नाव पडलेले. 

नोव्हेंबर ते मार्च हा त्यांचा विणीचा हंगाम. या काळात ती समुद्रकिनाऱ्यावर अंडी घालण्याकरता येतात. अनेकांनी एकत्रीतपणे किनाऱ्यावर येऊन अंडी घालणे ही त्यांची विशेषता. विणीच्या काळात अंधाऱ्या रात्री भरतीच्या वेळी ती समुद्रातून किनाऱ्यावर अवतरतात. योग्य तापमानाच्या वाळूत खड्डा खणून घरटी बनवतात. त्यात अंडी घालून खड्डा पुन्हा वाळूने भरतात. आणि समुद्रात परत निघून जातात. ती परत कधीही घरट्याकडे परतत नाहीत. 

एकावेळेस शे दीडशे अंडी एक कासवीण घालते. अश्या अनेक कासवीणी हंगामात अंडी घालतात. पंचेचाळीस ते साठ दिवसांनी अंड्यातून पिल्ले घरट्यातून बाहेर येतात आणि समुद्रात जातात. 

अर्थात जी काही अंडी वाचतात, पिल्ले जगतात ती. कारण ही अंडी घरट्यातून पळवली जातात. माणसे तर पळवतातच. त्याच जोडीने कुत्रे, कोल्हे, रानडुकरे, खेकडे हे ही पळवतात. वाळू उकरून घरट्यातली अंडी पळवली जातात. 

आता मात्र कासवांच्या अंड्यांचे संरक्षण व संवर्धनाचे कार्य करण्यात येत आहे. त्यात चिपळूणच्या सह्याद्री निसर्गमित्र संस्थेचा व स्थानिकांचा मोठा सहभाग आहे. प्रकाश डिंगणकर हा त्यापैकीच एक. 

एक उत्सुकता म्हणून आम्ही त्यांना विचारले की, विणीचा हंगाम हा तीन चार महिन्यांचा, त्यात अंडी घालण्याची वेळ अंधारी रात्र, मग कासवे अंडी घालायला किनाऱ्यावर आली आहेत हे कसे समजते? त्यात पुन्हा तुंम्हाला विजेरीचाही वापर करता येत नाही कारण तुम्ही सांगितले तसे त्या प्रकाशामुळे कासवे अंडी न घालता समुद्रात परत निघून जातात’. 

प्रकाश म्हणाला, “तसा आम्हाला साधारण अंदाज येतो. तिथीवरून काळोख्या रात्री कधी आहेत ते कळते.

आणि आम्हाला मदत होते ती टिटव्यांची. किनाऱ्याच्या परिसरात टिटव्या आहेत. कुठलाही परदेशी प्राणी तिच्या नजरेस पडला की टिटवी जोरजोरात ओरडायला लागते. आणि ती न थांबता ओरडत राहाते. तिचे ओरडणे ऐकू आले की आम्ही किनाऱ्यावर पोहोचतो. अजून एक गंमत म्हणजे टिटवीचे ओरडणे ऐकले की कोल्हेही येतात इथे. त्यांना पण कासवे आल्याची चाहूल लागते. कोल्हे कासवांच्या मागावर असतात. त्यांच्या मागे मागे जात घरटी उरकतात आणि आत पुरलेली अंडी खातात. ”

…………………..

वाघ बिबट्यांच्या हालचाली वानर, हरणे, मोर यांच्या ओरडण्याने, ‘कॅाल’ म्हणतात ते, कळतात, हे माहिती होते. कॅाल ऐकू येताच जंगल सफारीतले मार्गदर्शक व पर्यटक तिकडे जमा होतात, वाघ पहायला. परंतू टिटवीपण कासवांच्या किनाऱ्यावर झालेल्या आगमनाचा कॅाल देते हे माहिती नव्हते. मस्त वाटले ते ऐकून.

म्हणजे टिटवीची टिवटिवही अगदीच निरर्थक नसते तर!

 

लेखिका : श्री अनंत गद्रे

प्रस्तुती : जुईली केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सुग्रीवाचा नकाशा… भाग – २ – लेखिका : सुश्री लीना दामले (खगोलीना) ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ सुग्रीवाचा नकाशा… भाग – २ – लेखिका : सुश्री लीना दामले (खगोलीना) ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

(श्री. निलेश नीलकंठ ओक यांच्या भाषणावर आधारित.)

आता आपण दक्षिण अमेरिकेत जाऊ या. Paleontology, Archaeology and Astronomy या सगळ्यांचा मिळून उत्तम असा पुरावा मिळतो.  सुग्रीव सांगतो आहे की क्षीरसागर ओलांडून गेलात की तिथे तुम्हाला मंदेहा नावाचे नाना प्रकारचे डोंगरावरून खाली उलटे टांगलेले असे भयावह राक्षस दिसतील. उलटे टांगलेले म्हटल्याक्षणी आपल्या डोळ्यासमोर येतात ती वटवाघुळे. आता कोरोनाच्या संदर्भात तर आपल्याला माहितीय की या वटवाघूळांच्या मुळेच बॅक्टेरिया पसरले. आपल्या प्राचीन ग्रँथात या विषाणू जिवाणूंनाच राक्षस म्हणून संबोधले गेले आहे. उदा. आपल्या शतपथ ब्राह्मणात असे वर्णन आले आहे की आपल्या मृगाजीनावर बसण्यापूर्वी ते नीट झटकून साफ करून घ्या म्हणजे त्यातले सगळे राक्षस निघून जातील. वटवाघळे खरे तर जगभर पहायला मिळतात, मग इथल्याच वटवाघूळांच्या मध्ये काय विशेष आहे? तर इतर ठिकाणची वटवाघळे frugivorous असतात, बहुतेक करून छोटे किडे, फळे इ वर जगतात, पण दक्षिण अमेरिकेतली ही वटवाघळे म्हणजे vampire bats ही प्राण्यांच्या रक्तावर जगतात. मेलेल्या वटवाघूळांची कवटी बघितली तर समजते त्यांचे दात, सुळे  आणि जबडे किती तीक्ष्ण असतात ते. त्यामुळे त्यांच्या पासून जपून रहायला सुग्रीव सांगतो आहे.

आता कोणी म्हणेल की एवढाच एक पुरावा आहे का तुमच्याकडे तर नाही. तिथे एक विलक्षण जबरदस्त असा पुरातत्वीय पुरावा आहे. तो पुरावा  म्हणजे तिथल्या डोंगरावर असलेली त्रिशूळाच्या आकाराची आकृती. श्री. चमनलाल आणि पुण्याच्या डॉ. प. वि. वर्तकांनीही याबद्दल लिहिले आहे. जेव्हा स्पॅनिश लोक तिथे आले तेव्हा त्यांनी तिथल्या स्थानिक रहिवाश्यांना विचारले की हे तुम्ही तयार केले आहे का तर त्यांनी सांगितले आम्ही नाही आणि आमच्या पूर्वजांनी पण नाही हे केलेले. त्यामुळे तिथल्या रहिवाश्यांना सुद्धा माहीत नाही की हे कोणी केले आणि का केले आहे ते. मात्र या सगळ्या प्रश्नांची उत्तरे वाल्मिकी रामायणात मिळतात. आताच्या काळात त्याला Candelabra of Andes असे म्हणतात. तिथल्या डोंगरावर  ६०० ते ८०० फूट उंच त्रिशूळाची आकृती आहे. त्यात खणलेले चर २ ते ३ फूट खोल आहेत. समुद्रावरून १२ मैल दूरपर्यंत ते दिसू शकतात. डॉ. वर्तकांच्या पुस्तकात तर असेही लिहिले आहे की या आकृत्या फक्त आकाशमार्गाने जाणाऱ्यांना म्हणजे विमानातून जाणाऱ्यांनाच दिसू शकतात. सुग्रीव सांगतोय..

त्रिशिरा: कांचन: केतूस्तालस्तस्य महात्मन:

स्थापित: पर्वतस्याग्रे विराजति सवेदिक:

(त्रिशूळाच्या आकाराचा सुवर्ण ध्वज तिथे पर्वताच्या शिखरावर चमकताना दिसेल. त्याच्या पायाशी वेदिका पण दिसेल.)

त्या नंतर सुग्रीव हे कोणी केले त्याबद्दल सांगतो आहे.

पूर्वस्यां दिशी निर्माणं कृतं तत्  त्रिदशेश्वरै:

तत: परं हेममय श्रीमानुदयपर्वत:

(या आकृत्या उदय पर्वतावर इंद्राने पूर्व दिशा दर्शविण्यासाठी बनवल्या आहेत. पूर्व दिशेचा देव म्हणून सुद्धा इंद्र मानला जातो. इथे कृतं चे दोन अर्थ निघू शकतात. एक तर केले अशा अर्थी. दुसरं म्हणजे रामायण जर त्रेता युगात घडले असे धरले तर त्याच्याही आधी कृत युगात इंद्राने हे तयार केले असे म्हणावे लागेल.)

आता दक्षिण दिशा-

सुग्रीव आता दक्षिणेला जाणाऱ्या गटाला सूचना देतोय. दक्षिणेला जाणाऱ्या गटात त्याने तीन महत्वाच्या लोकांना घेतले आहे कारण सीतेला घेऊन रावण दक्षिणेला गेला हे त्यांना समजले होते. सीतेचे अलंकारही त्यांनी ओळखले होते. त्यामुळे ही दिशा महत्वाची होती. त्या तीन महत्वाच्या व्यक्ती म्हणजे अंगद, जांबवान आणि हनुमान. 

सुग्रीव वर्णन करायला सुरुवात करतो ते पार नर्मदा नदी पासून. नर्मदा, गोदावरी, कृष्णा, वेण्णा इ. नद्या आणि त्यांच्या भोवतीच्या प्रदेशाचे वर्णन तो करतोय. नंतर येते कावेरी. त्यानंतर मलय पर्वतावर तुम्ही जाल तेव्हा तिथून तुम्हाला अगस्त्य तारा दिसेल ,तो तारा जो आदित्या एवढा तेजस्वी आहे. याच्या उत्तरेला इतर कुठल्याही ठिकाणाहून हा तारा दिसणार नाही. ताम्रपर्णी नदीच्या जवळ हा भाग आहे. अगस्त्य तिथे कसा दिसेल तर जणू त्याचा एक पाय महासागरात आणि एक त्या पर्वतावर. नकाशात जिथे आडवी रेषा दिसते तिथपर्यंतच रामायण काळात अगस्त्य तारा दिसत होता. (आता पार दिल्ली पर्यंत दिसतो.) 

दक्षिण दिशेकडे जात जात तुम्ही शेवटी कुठे जाणार आहात तर तो प्रदेश आहे यमाची राजधानी आताचे अंटार्क्टिका. पितृ लोक आहे देवांचा लोक नाही. अतिशय अवघड अशी ती जागा आहे. तिथे जाणेही अवघड आणि गेलात तर परत येणे अवघड. आपल्याला आताही माहिती आहे की अंटार्क्टिकाला भेट देणे किती अवघड आहे ते. तर सुग्रीव सांगतोय असा असा प्रदेश तिथे आहे पण तुम्ही तिथे जाऊ नका.

पाश्चात्य समजुती प्रमाणे अंटार्क्टिका चा शोध इ स 1773 च्या आसपास लागला. पण इथे 14000 वर्षांच्या पूर्वी सुग्रीव त्याच भागाचे वर्णन करतो आहे. काही अतिशय जुन्या इटालियन navigators कडच्या नकाशाच्या मध्ये अंटार्क्टिका खंड दाखवला आहे आणि एवढेच नाही तर त्यावर नद्या दिसत आहेत. आताचा अंटार्क्टिका खंड पूर्णपणे बर्फ़ाने झाकलेला आहे. एक काळ असाही होता जेव्हा अंटार्क्टिकावर बर्फ नव्हते. तेव्हा तिथे नद्या होत्या. 

चार्ल्स हॅपगुड यांच्या पुस्तकात असा नकाशा दाखवला आहे जो मृगाजीनावर चितारला आहे. त्याला ‘पिरी रीस मॅप’ असे म्हणतात. त्यात actually अंटार्क्टिका खंड दक्षिण अमेरिकेशी जमिनीने जोडलेला आहे. (16 th century मॅप) ऑटोमन साम्राज्यातील Turkish admirer या नकाशा बद्दल सांगतोय की त्याने हा नकाशा हिंद चा अरेबिक नकाशा,पोर्तुगीज, सिंध, हिंद आणि चीन इथल्या नकाशांवरून बनवला आहे. इथे हिंद हा शब्द येतोय.

१६ व्या शतकातला नकाशा, सुग्रीवाचा नकाशा यांच्या तुलनेत १९ व्या शतकातल्या युरोपियन लोकांच्या नकाशात अंटार्क्टिका चा भाग रिकामा दाखवला आहे.  याचाच अर्थ पिरी रीस नकाशाचा मूळ स्रोत खूप प्राचीन असला पाहिजे. ज्या अंटार्क्टिका खंडा बद्दल पाश्चात्यांना १८,१९ व्या शतका पर्यंत खात्रीलायक माहिती नव्हती त्याची सविस्तर माहिती सुग्रीव १४००० वर्षांच्या पूर्वी देतोय. भारतीयांनो आपल्याला अत्यन्त अभिमानास्पद अशी ही गोष्ट आहे, नाही का?

– समाप्त – 

लेखिका : सुश्री लीना दामले (खगोलीना)

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सुग्रीवाचा नकाशा… भाग – १ – लेखिका : सुश्री लीना दामले (खगोलीना) ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ सुग्रीवाचा नकाशा… भाग – १ – लेखिका : सुश्री लीना दामले (खगोलीना) ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

(श्री. निलेश नीलकंठ ओक यांच्या भाषणावर आधारित.)

 आपण बघितले की रामायणाचा काळ आहे 14000 वर्षांपूर्वीचा. आणि खगोलशास्त्रीय उल्लेखांच्या आधारावर श्री.नीलेश ओक यांनी ते सिद्ध केले आहे. आताच्या काळातील भौगोलिक वैशिष्ट्ये, जमीन, नद्या, समुद्र जसे आहेत तसेच ते 14000 वर्षांपूर्वी नव्हते. 

वाल्मिकी रामायणात आलेले भौगोलिक वर्णन आताच्या काळातील पुरातत्व शास्त्र, जीवाष्म शास्त्र, समुद्रशास्त्र, हवामानशास्त्र, मानववंशशास्त्र, भूगर्भशास्त्र, भूगोल, अनुवंशशास्त्र, खगोलशास्त्र आणि प्राचीन भारतीय आणि भारता बाहेरील काही निवेदने, वृत्तांताच्या आधारे मिळालेले पुरावे यांच्याशी अतिशय सुंदर तऱ्हेने जुळतात. 

सीतेच्या शोधा साठी जेव्हा वानरसेना निघाली तेव्हा सुग्रीव त्यांना कोणी कुठे कसे जायचे ते समजावून सांगतो आहे. सुग्रीवाने त्या वानरसेनेचे चार भाग पाडून त्यांना चार दिशांना जायच्या सूचना दिल्या आहेत. 

दक्षिण दिशेकडे जाणाऱ्या वानरसेनेच्या गटाला सुग्रीव सांगतोय की तुम्ही जेव्हा या भूभागाच्या (म्हणजे भारताच्या) आग्नेय दिशेला तुम्ही महेंद्र पर्वतावर याल तेव्हा तिथून तुम्हाला अगस्त्य हा तेजस्वी तारा दिसेल तो फक्त तिथूनच तुम्हाला दिसू शकेल आणि तो सुर्या इतका तेजस्वी दिसेल. आता यात वैशिष्ट्य हे आहे की अगस्त्य फक्त तिथूनच का दिसेल असे म्हटले आहे तर त्या काळात तो फक्त भारताच्या अगदी दक्षिण टोकावरूनच दिसू शकत होता इतरत्र कुठूनही नाही. आता अगस्त्य हा तारा अगदी नवी दिल्ली येथूनही दिसतो. यावरून सुद्धा तो काळ 14000 वर्षांपूर्वीचा होता हे समजते. परत कारण तेच, पृथ्वीची परांचन गती.

पावसाळा उलटून गेल्यावर सुग्रीवाने आता सगळ्या वानरसेनेला एकत्र केले आहे. राम लक्ष्मण आणि सुग्रीव एके ठिकाणी बसले आहेत. सुग्रीव पहिल्यांदा पूर्व दिशेला अँडीज पर्वता पर्यंत वाटेत काय काय दिसेल ते सांगतो आहे. दक्षिण दिशेला भारतापासून अंटार्क्टिका पर्यंत काय काय दिसेल ते सांगतो आहे. याचा अर्थ असा नाही की वानरसेना अँडीज पर्वता पर्यंत किंवा अंटार्क्टिका पर्यंत जाऊ शकणार होती किंवा गेली होती. सुग्रीव फक्त सांगतोय. उलट सुग्रीव या ठिकाणी स्वच्छ सांगतो आहे की अंटार्क्टिका पर्यंत जाऊ नका. पश्चिमेला भारतापासून आल्प्स पर्यंत तो काय काय दिसेल ते सांगतो आहे. 

आपण आधी पूर्व दिशे पासून सुरुवात करू. सुग्रीवाने चार दिशांना जाणारे चार गट केले. प्रत्येक गटाचा एक नेता ठरवला. पूर्व दिशेला जाणाऱ्या गटाचा नेता होता विनता. त्यासाठी आपल्याला आधी थोडी अनुवंशिकता आणि पुरातत्व शास्त्र यांच्या अनुषंगाने विचार करावा लागेल. नव्या जेनेटिक संशोधनातून हे समजते की दक्षिण भारतापासून ते ऑस्ट्रेलिया ते दक्षिण अमेरीके पर्यंत एक जेनेटिक सिग्नल नजरेस पडतो. South East Asia, पापुआ न्यूगिनी, अंदमान निकोबार इ देशांचा यात समावेश आहे. यातून तो जेनेटिक ट्रेल जातो असे संशोधन आहे. पुरातत्वीय पुरावे हे सांगतात की माणसाचे अस्तिव दक्षिण अमेरिकेतील चिले येथे 33,000 BCE पासून आहे तर पनामा येथे 50,000 BCE पासून आहे. त्यामुळे सुग्रीवाने 12209 BCE च्या काळातील भौगोलिक वर्णन केले तर त्यात नवल वाटायला नको.

आता सागरीशास्त्राच्या दृष्टिकोनातून 14,000 BCE च्या वेळी पृथ्वीचा नकाशा कसा असू शकेल ते बघू. त्या वेळी आशिया खंड उत्तर अमेरिकेशी सरळ सरळ जमिनीने जोडलेला होता. तसेच भारतही इंडोनेशिया, लाओस, थायलंड अगदी ऑस्ट्रेलिया पर्यंत भागांशी सरळ जमिनीने म्हणजे land mass ने जोडलेला होता. आणि हे का तर त्यावेळी समुद्रसपाटी आताच्या काळा पेक्षा 120 ते 140 मीटर्स खाली होती म्हणून बरीचशी जमीन उघडी पडली होती.

आता सुग्रीव सांगतोय की तुम्ही त्या दिशेला जाल तेव्हा तुम्हाला खूप वेगवेगळ्या तऱ्हेची माणसे दिसतील. ज्यांच्या कानाची पाळी खांद्यापर्यंत लोम्बलेली असेल, त्यांचे ओठ लांबत जाऊन छाती पर्यंत ओघळले असतील. काही लोक कच्चे अन्न, कच्चे मासे खाताना दिसतील. ( इथे सुशी ची आठवण आल्या खेरीज रहात नाही). आता सुद्धा लाओस मध्ये पौडांग स्त्री, इंडोनेशिया मधील कानाची पाळी खांद्या पर्यंत ओघळलेली अशी स्त्री, खूप लांब जीभ असल्याचे डेकोरेशन केलेला द. अमेरिकेतला माणूस किंवा लांब कृत्रिम हनुवटी असलेली माणसे आजही दिसतात. South East Asia ते पापुआ न्यु गिनी येथे अशी चित्र विचित्र केश वेष भूषा केलेली वेगवेगळ्या टोळ्यांची माणसे आजही बघायला मिळतात. आफ्रिकेतही तऱ्हेतऱ्हेची माणसे ज्यांचे ओठ, कान अनैसर्गिक पणे ओघळलेले दिसतात. लांब कशाला अगदी आपल्या देशात दक्षिणेतील  सुपर माची नावाच्या एका  तेलगू सिनेमातील वयस्कर नटीच्या कानाची भोके अशीच खांद्यापर्यंत ओघळलेली आजही बघायला मिळतात. अगदी तस्सेच चित्रविचित्र माणसांचे वर्णन रामायणात सुग्रीवाच्या तोंडून वदवले आहे.

आता सुग्रीव ७ वेगवेगळ्या द्विपांची वर्णने करतो आहे. सुवर्ण द्वीप, रजत द्वीप, यवद्वीप  म्हणजे ओट्स इ.  त्या त्या बेटावर सोन्या चांदीच्या खाणी होत्या. यवद्वीपावर मोठ्या प्रमाणात यवाची शेती होत होती.  त्या काळात भारत खूप तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ बाहेरच्या देशांना देऊन तिकडून सोने, चांदी आयात करत होता. आणि ज्या ज्या बेटावरून सोने चांदी येत होती त्या त्या बेटांच्या नावाने ते सुवर्ण किंवा चांदी ओळखली जाते होती. जसे की जामबुनद सुवर्ण, सुवर्णद्वीप सुवर्ण, पारुजम, परू येथे मिळणारे सुवर्ण इ.

या सात बेटांच्या मधील वेगवेगळ्या (प्रॉव्हिन्सस) प्रांतांच्या चिन्हाच्या (एमब्लेम) मध्ये अशी नावे येतात. उदाहरणार्थ इंडोनेशियाच्या एका प्रॉव्हिन्स च्या चिन्हावर ‘ जय राया’ असे लिहिले आहे. कलीमंथन उत्तरा, बाली द्वीप जया, जावा बेटांच्या चिन्हावर ‘शक्ती भक्ती प्रजा’ असे लिहिलेले आहे. पापा इंडोनेशियाच्या एका चिन्हावर ‘ कार्य स्वाध्याय’ असे लिहिलेले आहे. बिननेक तुंगल इक म्हणजे  चक्क Unity in  diversity असे इंडोनेशियाच्या गरुडाच्या चित्राखाली लिहिलेले आहे. त्यानंतर पुढे त्या वेळच्या ज्वालामुखीचे, तलावांचे वर्णन त्यात येते.

आता आपण प्रशांत महासागर (क्षीरसागर) ओलांडून जाऊया. पॉलीनेशियातील भाषांचा संस्कृतीशी कसा संबंध येऊ शकतो याचा अभ्यास Uschi Ringleb नावाची एक कॅनेडियन संशोधक करते आहे. पॉलीनेशियातील एक नृत्यप्रकार आहे उला डान्स म्हणजे ‘सीवा’ डान्स. त्यांच्या भाषेत सीवाचा अर्थ नाच. इथे सीवा म्हणजे नृत्य करणारा आपला नटराज आठवल्या खेरीज रहात नाहीच. पॉलीनेशियाच्या काही भागात s चा h होतो आणि त्यामुळे सीवा चा हिवा. त्यामुळे तो नृत्यप्रकार हिवा डान्स म्हणून पण प्रसिद्ध आहे.

– क्रमशः भाग पहिला 

लेखिका : सुश्री लीना दामले (खगोलीना)

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ न वाचलं गेलेलं पत्र ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

न वाचलं गेलेलं पत्र ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

मेजर राजेश सिंग अधिकारी, महावीर चक्र (मरणोपरांत) 

भारत-पाकिस्तान कारगिल युद्ध. ३० मे,१९९९. 

दहाच महिन्यांपूर्वी त्याची अशीच वरात निघाली होती आणि तिच्या दारी आली होती. घोड्यावर बसलेला तो राजबिंडा…रूबाबदार! लष्करात अधिकारी असलेला तो होताच तसा देखणा. आठ वर्षांच्या सेवेत लष्कराने शिस्तीच्या संस्कारात एका कोवळ्या तरूणाचे मजबूत शरीरयष्टीच्या,अदम्य आत्मविश्वास असलेल्या, भेदक नजर असलेल्या एका जवानात रुपांतर केले होते… सैन्याधिकारी… राजेश सिंग धर्माधिकारी! इतक्या वर्षांत त्याने मेजर पदापर्यंत मजल मारली होती…आणि  आता तो बनला होता दीडशे ते दोनशे सैनिकांचे नेतृत्व करणारा लढवय्या. १९९९ वर्ष निम्मे सरत आलेले होते. कारगिल परिसरातून आता मेजर साहेबांची बदली होण्याचे दिवस जवळ आले होते. पण….कारगिलच्या शिखरांवरून अप्रिय बातम्यांचा वारा खाली घोंघावू लागला. 

सुरुवातीला वाटले होते की पाकिस्तानातून भारतात कश्मिरविरोधात भारतीय सैन्याला उपद्र्व देण्यासाठी घुसलेले अतिरेकी असावेत आणि तेही नेहमीप्रमाणे अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच. पण धर्माधिकारी साहेबांनी त्या पर्वतशिखरांवरून आपले हेलिकॉप्टर उडवत नेले आणि टेहळणी केली तर परिस्थिती गंभीर होती. घुसखोरांची संख्या अपेक्षेपेक्षा कित्येकपटींनी जास्त होती. शिवाय त्यांनी शिखरांच्या मोक्याच्या ठिकाणी पक्के आणि सुरक्षित बंकर्स खोदून ठेवलेत…त्यातून त्यांना खाली नेम धरणे सोपे होते. आणि अतिशय कडाक्याच्या थंडीपासून बचावासाठी त्यांनी अगदी जय्यत तयारी केलेली होती. गरम कपडे,बूट,हवाबंद पौष्टिक अन्नपदार्थ,संपर्क साधने आणि इतक्या उंचीवर आणून ठेवलेला पुरेसा दारूगोळा! 

मेजरसाहेब तळावर परतले ते चेह-यावर काळजीचा रंग घेऊनच. शत्रू आपल्या अत्यंत जवळ आला आहे. त्यांनी सहका-यांना सावध केलं. तोवर कारगिलच्या इतरही शिखरांबाबत हीच परिस्थिती असल्याचं स्पष्ट झालं होतं. कॅप्टन सौरभ कालिया साहेबांचं गस्तीपथक परतलेलं नव्हतं..त्यांना शोधायला गेलेल्या पथकावरही तुफान हल्ला होऊन पथक नेस्तनाबूत झालं होतं. मेजर धर्माधिकारी यांच्या समोर तोलोलिंग नावाचं भारताचं पर्वतशिखर आता शत्रूच्या ताब्यात होतं. आणि हे शिखर पुन्हा हस्तगत करायचं म्हणजे प्रत्यक्ष मरणाला सामोरं जाणं. कारण परिस्थिती शत्रूला शंभर टक्के अनुकूल होती…पण तोलोलिंग परत घेतलं तरच इतर शिखरं पादाक्रांत करता येणार होती. 

योग्य वेळ पाहून शिखरावर चढाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण पहिला प्रयत्न अर्धवट सोडून द्यावा लागला…कारण दाट धुकं,वरून शत्रूचा तुफान आणि अचूक गोळीबार. त्यात शत्रूच्या स्नायपरने आपल्या एका ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर यांना अचूक टिपून धारातीर्थी पाडलं होतं. त्यादिवशी अधिक चढाई करणं अशक्य झाल्यानं खट्टू होऊन माघारी फिरणं भाग पडलं. 

त्यादिवशी पलटणीत सैनिकांच्या कुटुंबियांची पत्रं पोहोचली. जशी चातकाला पावसाच्या पहिल्या थेंबांची प्रतिक्षा तशी जवानांना आपल्या आप्तांची ख्यालीखुशाली समजण्याची उत्कंठा. मेजर धर्माधिकारी तर नवविवाहीत. आणि राजेश आणि किरण…त्यांच्या संसाराच्या वेलीवर उमलू पाहणा-या एका फुलाच्या प्रतीक्षेत आणि स्वप्नात मग्न असलेलं दांपत्य! पण सीमेवर जमा झालेले युद्धाचे ढग आता किरण यांच्या घरापासूनही स्पष्ट दिसत होते. काळजाला लागलेल्या घोर काळजीचे प्रतिबिंब प्रत्येक शब्दात अगदी आरशासारखे स्वच्छ दिसत होते. पण…मेजरसाहेब तर आता मोहिमेवर निघालेले होते. त्यांना सोळा हजार फुट उंचीवर त्यांच्या पत्नीचे पत्र मिळाले! एका हातात पत्नीचे पत्र, एका हातात तोलोलिंगचा नकाशा आणि खांद्यावर रायफल. डोळ्यांनी पहावे तरी काय आणि वाचावे तरी काय? मेजरसाहेब सहका-यांना म्हणत होते… नकाशा वाचला पाहिजे…तेथून परतल्यावर निवांतपणे वाचता येईल की बायकोचं पत्र! असून असून असणार काय पत्रात? काळजी वाटते, काळजी घ्या…वाट पाहतो आहोत…आम्ही…म्हणजे मी आणि आपलं बाळ!  

तोलोलिंगवर चढाई करता येईलच पण जिवंत परतण्याची शक्यता शून्य! लष्करात जिंदगी घालवलेल्या सर्वांना हे दिसत होतं…आणि त्यात हा गडी म्हणतोय…मोहिमेवरून आल्यावर निवांत वाचेन की पत्र! इतर जवानांना मोहिमेवर निघताना आपल्या कुटुंबियांशी बोलता यावं म्हणून अधिका-यांनी खास सॅटेलाईट फोनची व्यवस्था केली होती. मेजर राजेश साहेबांनी आपल्या साथीदारांना आधी बोलू दिलं…साहेबांचा नंबर लागला आणि त्या सॅटेलाईट फोनची बॅटरी संपली…बोलणं झालंच नाही…शेवटपर्यंत. 

मागच्याच आठवड्यात मेजरसाहेबांनी आपल्या अर्धागिंणीला पत्र धाडलं होतं. “मला लढाईला पाठवलं जातंय…आणि मलाही जायचंच आहे खरं तर. सैनिकासाठी लढाई म्हणजे एक तीर्थयात्रा…दोन्ही लोकी आशीर्वाद देणारी. मी परत येण्याची शक्यता धूसर आहे. नाहीच आलो तर आपल्या होणा-या बाळाला कारगिलच्या या शिखरांवर नक्कीच घेऊन ये. दाखव त्याला..त्याचा बाप कुठे लढला ते! देशाचा संसार सावरला तरच मी आपला संसार भोगू शकेन. या पत्राच्या उत्तरात तू काय लिहिणार आहेस हे मला आधीच ठाऊक आहे….!” 

याच पत्राचं उत्तर आलं असावं…आणि त्यात बाईसाहेबांनी काय लिहिलं असावं याची उत्सुकता मेजरसाहेबांना असण स्वाभाविक होतं. पण कर्तव्यापुढे वैय्यक्तिक आयुष्य कवडीमोलाचं असतं सैनिकांसाठी! संसार तर होत राहील….देशाचा संसार राखणं गरजेचं होतं. मेजरसाहेबांनी ते पत्र न उघडताच आपल्या ह्र्दयावरील खिशात अलगद ठेवून दिलं आणि प्लाटून…लेट्स मार्च अहेड! असं खड्या आवाजात म्हणत ते आपल्या सहकारी सैनिकांच्या चार पावलं पुढेच निघाले….नेत्याने अग्रभागी राहायचं असतं…शत्रूला भिडायचं असतं. नव्वद अंशाचा,चढण्यास अशक्य असलेला कोन,पहाटेचा अंधार,जीवघेणी थंडी,वरून होणारा गोळीबार. खरं तर शत्रू इतका आरामशीर बसला होता की त्यांना गोळ्याही झाडण्याची गरज पडली नसती…केवळ एखादा दगड जरी वरून भिरकावला असता खाली तरी वरती चढण्याच्या प्रयत्नात असलेला भारतीय जवान खोल दरीत कोसळून गतप्राण होईल…आणि तसं होतही होतं. 

मेजरसाहेबांना आता थांबायचं नव्हतं. त्यांनी आपल्या तुकड्यांना तोलोलिंगला तिन्ही बाजूने वेढण्याचे आदेश दिले. आणि मधल्या तुकडीच्या अगदी पुढे निघाले सुद्धा…त्यांच्या दिशेने अर्थातच तुफान गोळीबार सुरु झाला….दुश्मनांकडे अत्याधुनिक शस्त्रं होती आग ओकणारी. मेजरसाहेब तशाही स्थितीत मोठमोठे दगद शिताफीने ओलांडत आणि त्याचवेळी आपल्या गनमधून वर फैरी झाडत इंचाइंच करीत वर जात होते. शत्रू लपून बसलेल्या पहिल्या बंकरपर्यंत पोहोचताच त्यांची आणि शत्रूच्या दोन जवानांची समोरासमोर गाठ पडली…मेजरसाहेबांनी त्या दोघांशी हातघाईची लढाई लढली. शत्रू काही अर्धप्रशिक्षित घुसखोर अतिरेकी नव्हता…पाकिस्तानी लष्कराचा नियमित सैनिक होता. पण भारतीय लष्कराचे प्रशिक्षण वरचढ ठरले….आणि भारतीय जवानांचे मनोधैर्यही! मेजरसाहेबांनी दोघांचाही खात्मा केला…हे सगळं करत असताना त्यांच्या देहात गोळ्या घुसलेल्या होत्या. हे सगळं त्यांचा एक सहकारी काही अंतरावरून पहात होता…तेव्हढ्यात त्याच्या संपर्क साधनावर वरीष्ठ अधिका-याने संपर्क साधला….सहकारी म्हणाला…अधिकारी साहब…जांबाजीसे लड रहे है….” तितक्यात एका गोळीने या सहका-याचा वेध घेतला…संपर्क कायमचा समाप्त झाला. 

इकडे मेजरसाहेबांनी पुढे कूच केले…पहिला बंकर जवळ जवळ ताब्यात आलेला असतानाच त्यांच्यावर अगदी जवळून गोळीबार झाला….आणि देहाचा आणि जीवाचा संबंध संपुष्टात आला! आता आत्मा मुक्त झाला होता स्वर्गात जाण्यास! मेजरसाहेबांचे सोबतीही या प्रवासात त्यांच्याच सोबत होते! यश थोडे मिळालेले असले तरी त्या यशाने पुढच्या यशाचा पाया रचला होता….ही अशक्यप्राय कामगिरी होती….हे खरं तर आपलंच अपयश होतं….शत्रूच्या कावेबाजपणाचा अंदाज यायला तसा खूप उशीर झाला होता आणि हा डाग धुण्यासाठी रक्तच कामी येणार होतं…आणि सुदैवानं या रक्ताची टंचाई नाही आपल्याकडे. 

छातीत घुसलेल्या गोळ्या… त्यातून रक्ताचे प्रवाह शरीरभर ओघळत असताना त्या रक्ताने मेजरसाहेबांच्या खिशातील पत्रालाही अभिषेक घातला….सौ.किरण अधिकारी यांनी जीवाच्या तळापासून लिहिलेले शब्दांनी लालरंग ल्यायला होता….विरहाची पत्रं प्रेमिकांच्या आसवांनी भिजतात …इथं शेवटचा निरोप रुधिराने ओलाचिंब झालेला होता. 

बारा तेरा दिवस मेजरसाहेब आणि सहका-यांचे निष्प्राण देह तोलोलिंगवर शत्रूच्या बंकर्समध्ये निश्चेष्ट पडून होते……युद्धाच्या धुमश्चक्रीत तिथपर्यंत पोहोचणं अशक्य होतं…आणि ते देह परत मिळवण्याचा वज्रनिर्धार करून पुन्हा तोलोलिंगवर चढाई करण्यास आणखी जवान आणि अधिकारी सज्ज होते! लीव न में बहाईंड. कोई साथी पिछे न छुटे! 

मेजरसाहेबांच्या घरी चौदा दिवस काहीही खबर नव्हती….कलेवरंच नव्हती तर हौतात्म्य जाहीर तरी कसं करायचं? कोण जाणो…चमत्कार झालेलाही असावा! पण असे चमत्कार विरळा! 

आज मेजरसाहेब आपल्या स्वत:च्या घरी आले होते…जसे नव्या नवरीला घरी मिरवणुकीने घेऊन आले होते तसे…पण आज दृश्य वेगळे होते. फुलं होती,हार होते…पण ते सरणावर जाणा-या देहावर पांघरण्यासाठी. हजारो लोक होते सोबत…पण त्यांच्या ओठांवर अमर रहेच्या घोषणा आणि डोळ्यांत आसवं. 

ती अगदी स्तब्ध उभी होती त्याच्या. इतरांच्या शोकाच्या गदरोळात तिचं शांत राहणं भयावह होतं. लोकांना आता तिचीच काळजी वाटू लागली…दु:खानं भरलेलं काळीज मोकळं नाही झालं तर काळीज फाटून जातं…अल्फ्रेड लॉर्ड टेनिसनने लिहून ठेवलंय… Home they brought her warrior dead: She nor swoon’d nor utter’d cry:All her maidens, watching, said, “She must weep or she will die.” त्यांनी त्या हुतात्मा योद्ध्याचा,तिच्या पतीचा मृतदेह तिच्या घराच्या अंगणात आणून ठेवला आहे…पण ती थिजून गेलीये…एकही हुंदका फुटत नाहीये….ती रडली नाही तर ती सुद्धा मरून जाईल…(मग तिच्या नवजात बाळाचं काय होईल?) पण इथं कुणी काहीही बोलायची हिंमत करत नव्हतं! ती बराच वेळ तशीच उभी राहिली त्याच्या कलेवराजवळ…आणि तेवढ्यात पार्थिव घेऊन आलेल्या लष्करी अधिका-याने तिच्या हातात मोठ्या अदबीने एक लिफाफा ठेवला…त्या लिफाफ्यावर ठळक अक्षरात नाव होतं…तिच्याच अक्षरात….मेजर राजेश अधिकारी यांस….! लिफाफा फोडला गेलेला नव्हता..आतलं पत्र तसंच होतं…वाचलं न गेलेलं!  

तो आता ते पत्र कधीही त्याच्या डोळ्यांनी वाचू शकणार नव्हता…मात्र त्याचा आत्मा कदाचित पत्रातील मजकूर ऐकायला आतुर झालेला असेल…तिने आसवांच्या शब्दांनी त्याच्या कानात तिने पत्रात लिहिलेला मजकूर ऐकवला असेल…तिने लिहिले होतं….तुम्ही परत आलात तर मी खूप भाग्यवान समजेन स्वत:ला, पण मातृभूमीच्या रक्षणार्थ तुम्ही प्राणांचं बलिदान दिलंत तर एका योद्ध्याची पत्नी म्हणून मी अभिमानाने जगेन. आपलं होणारं बाळ मुलगा असेल की मुलगी मला माहित नाही…पण मी त्या बाळाला तुम्ही लढलात त्या युद्धभूमीवर निश्चित घेऊन येईन…आणि त्याला किंवा तिला तुमच्यासारखंच शूर योद्धा बनवीन….तुम्ही माझे हे उत्तर तुमच्या डोळ्यांनी वाचलं असतं तर तुम्हांला किती आनंद झाला असता ना…राजेश?  तुम्हांला इन दी हेवन हे गाणं म्हणायला आवडायचं ना!  

Beyond the door There’s peace, I’m sure And I know there’ll be no more Tears in heaven…स्वर्गात आसवांना जागा नाही मुळीच….सुखद शांतता असते तिथे….मला माहित आहे…तुम्ही त्या स्वर्गात सुखनैव रहाल! 

(पंचवीस वर्षांपूर्वी कारगिल युद्धाच्या अगदी आरंभीच्या दिवसांत तोलोलिंग नावाचं महत्त्वाचं शिखर पाकिस्तान्यांकडून ताब्यात घेण्यासाठी तेथील पत्थरांना आपल्या जवानांनी अक्षरश: रक्ताचा अभिषेक घातला. यातीलच एक तरूण रक्त होतं मेजर राजेशसिंह अधिकारी यांचं. मुंबईच्या सैनिकप्रेमी भगिनी उमा कुलकर्णी या रोज एका सैनिकाची माहिती पोस्ट करीत असतात. त्यातूनच अधिकारी साहेबांच्या पराक्रमाविषयी वाचायला मिळालं. आणि महावीर चक्र (मरणोत्तर) विजेते मेजर राजेशजी अधिकारीसाहेब आणि त्यांच्या पत्नीचा,कुटुंबियांचा त्याग प्रखरतेने नजरेसमोर आला. त्या पोस्टवर आधारीत हा लेख आहे.) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दयाघना आणि रसूल अल्लाह ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ दयाघना आणि रसूल अल्लाह ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

तिच्या देहाची कितीतरी वर्षांपूर्वीच माती झालीये…पण तिचा आत्मा अजूनही अधांतरीच आहे, अडकून पडलाय काळकोठडीत..बंदिवासात ! ती एकटीच आहे इथे…या प्रशस्त राजप्रासादात. अगदी रया गेली आहे या वास्तूची. पडक्या भिंती…दिवाणखान्यातील रंग उडालेली तैलचित्रं आणि भंग झालेली शिल्पं. क्रूर श्वापदांचे अक्राळ विक्राळ मुखवटेही आता केविलवाणे भासताहेत. तिला या बंदिवासात ढकलणारा सुद्धा आता या जगात नाही, आणि तिला सोडवण्याचा प्रयत्न करणाराही कुठं दिसत नाही. आत्म्याला देहाच्या मर्यादा नाहीत आता…पण तरी तिला त्या बेसुमार मरुभूमीच्या पल्याड जाण्याचा मार्ग गवसत नाहीये…ती आजही अशीच मध्यरात्र उलटून गेल्यावर आपल्या कोठडीतून तिच्या उस्तादाच्या कोठडीपर्यंत धावत आलेली आहे….उस्ताद तिचा संगीत शिक्षक…ती आणि तिची थोरली बहिण गाणं-नाचणं शिकायच्या या उस्तादाकडे. राजवाड्यातल्या हुकुमची कामुक नजर पडली होती तिच्या थोरल्या बहिणीवर. पण उस्तादाने डाव ओळखून या दोघींना,त्यांच्या बापाला  सावध केलं…आणि तिथून दूर निघून जा असं बजावलं. पण त्या राजवाड्याच्या भिंतींना भले मोठे कान होते…राजाचे कानही तिखट होते. त्याने पळून जाऊ पाहणा-या बापलेकीला चाबकाने फोडून अर्धमेलं केलं…फेकून दिलं वाळवंटातल्या तापल्या मातीत तडफडून मरण्यासाठी. ही धाकटी..अजून वयात यायची होती आणि फार फार तर चार-पाच वर्षात बाई होणारच होती ! राजाने तिला कैदेतच ठेवलं आणि उस्तादाला सुद्धा. 

मध्ये कित्येक वर्षे उडून गेलीत..एका ठिकाणची वाळू दूर उडून जाऊन तिने भलतीकडेच आपलं बस्तान बसवलं आहे. उस्तादही नाहीत…पण आज तिला ते दिसताहेत…त्यांच्या कोठडीत मंद दिवा मिणमिणतो आहे…त्यांनी राग ‘पूर्वी’ छेडला आहे….स्वर अगतिक आहेत…विदग्ध आहेत ! धर्मानं अल्लाहचा बंदा आहे उस्ताद…त्याच्या रसूल अल्लाहला विनवणी करतो आहे….कर दो कर दो… दूर पीर हमारी ! हे ईश्वरा…हे दु:ख,पीडा दूर कर आमच्या जीवनातली…! 

इथं पंडित ह्रदयनाथ मंगेशकरांचा आर्त स्वर वाळवंटाच्या खोल उरातून उगवतो आहे….त्यांनी केंव्हातरी दीनानाथांच्या मुखातून ऐकलेली एक बंदिश….राग पूर्वी मधली…यावरच पुरिया धनाश्री आधारलेला आहे असे अभ्यासक म्हणतात. दीनानाथांच्याच ‘बाळ’मुखातून ही बंदिश आता  स्रवते आहे. स्वरांच्या लेखी ईश्वर-अल्लाह एकच…स्वर पाण्यासारखे प्रवाही आणि रंगहीन असतात ! संगीत-साधकाला स्वर प्यारे..शब्द केवळ स्वरांची पालखी वाहणारे दास !  

क्षुधित पाषाण (Hungry Stone) या रवीन्द्रनाथ टागोरांच्या कादंबरीवर आधारीत गुलजार यांनी लिहिलेली चित्रकथा म्हणजे हिंदी चित्रपट ‘लेकीन’! डिम्पल कपाडिया..विनोद खन्ना. वर्ष १९९०. लतादीदी निर्मात्या आणि हृदयनाथ मंगेशकर संगीत दिग्दर्शक. ‘यारा सीली सीली (ओलसर) बिऱहा की रात का जलना’…सारखी अनेक मधुर गाणी दिली बाळासाहेबांनी..स्वर अर्थातच थोरल्या बहिणीचा..दीदीचा !  ‘लेकीन’ मधलं ‘सुरमयी शाम जिस तरहा आये..सांस लेते हैं जिस तरहा साये’…आणि मुलायम आवाजाची देणगी लाभलेले सुरेश वाडकर…आठवताहेत का? 

या आधी १९८० मध्ये यशवंत दत्त अभिनित ‘संसार’ नावाचा मराठी चित्रपट आला होता. गीतकार होते सुधीर मोघे नावाचे अमोघ शब्द रचना करणारे कवी. बाळासाहेबांनी त्यांच्या ‘दयाघना..का तुटले चिमणे घरटे…उरलो बंदी असा मी !’ या काव्याला सुंदर चालीत चालवताना ‘पूर्वी’चेच सूर दिलेत..! आणि चित्रीकरणात यशवंत दत्त यांनी गाणे जगून दाखवलं आहे.    

….. हे दयाघना, माझं इवलंसं घरटं मोडून पडलंय आणि उरलो आहे फक्त मी..एकाकी! माणसाचा जन्मच जणू एक कारागृह. इथं मागील जन्मातील कर्मांची फळं रोख भोगायला जन्माला यायचं आणि या जन्मातही कर्मांच्या गाठोड्यात आणखी भर घालत बसायचं..’ पुनरपि जननं…पुनरपि मरणं..पुनरपि जननी जठरे शयनं !’ हा बंदिवास मला चुकणारच नाही…मी तुझा बंदिवान ! या कोठडीला दहा दिशांच्या  मजबूत भिंती आहेत आणि कैद्यांच्या हातात मोहाच्या,मायेच्या अवजड बेड्या….स्वत:हून काढल्या तरच निघणा-या ! पण या बेड्या काढण्याची,फेकून देण्याची इच्छाच होत नाही इथल्या बंदिवानाला..सवयीचं झालेलं असतं…यालाच माया म्हणतात…’मा’…णसाला ‘या’…तना देणारी !  ही माया माझे प्राण व्याकूळ करते आहे…देवा ! जन्माच्या चुलांगणावर बालपणीचं दुधाचं भांडं ठेवलं आहे…आणि त्याकडे खेळण्याच्या नादात ध्यानच नाही गेलं..बालपण उतू गेलं…अग्निच्या मुखात गेलं ! उरलेल्या दुधात वासनांचा मिठाचा खडा पडला नकळत…नासायाला वेळ नाही लागला !… आता देह वार्धक्याच्या वळचणीला येऊन उभा राहिला आहे…श्वास बालपण आठवू देत नाहीत, आणि तारुण्याच्या माजघरात पाय ठेवू देत नाहीत…अंगणात ऊन आहे…याच अंगणात हा देह एके दिवशी आडवा निजलेला दिसणार आहे…शेवटच्या प्रवासाला जाण्यासाठी…दयाघना ! का तुटलं माझं घरटं? हा प्रश्न नाहीये…हा स्वत:शी केलेला वैराण संवाद आहे..बंदिवानाला उत्तर मागण्याचा अधिकार नसतो !      

दयाघना, का तुटले चिमणे घरटे ?

उरलो बंदी असा मी !

अरे, जन्म बंदिवास सजा इथे प्रत्येकास

चुके ना कुणास आता बंदी तुझा मी दयाघना !

 

दहा दिशांची कोठडी मोह-माया झाली वेडी

प्राण माझे ओढी झालो बंदी असा मी दयाघना !

 

बालपण उतू गेले अन्‌ तारुण्य नासले

वार्धक्य साचले उरलो बंदी पुन्हा मी दयाघना !

(आंतरजालावर हृदयनाथ आणि लता दीदी एका जाहीर कार्यक्रमात वर उल्लेख केलेली रसूल अल्लाह ही बंदिश सादर करतानाचा विडीओ आहे. दीदीनी एक स्वर लावलाय…उंच…आणि तो स्वर अपेक्षित ठिकाणी पोहोचल्यावर त्यांच्या चेह-यावरचं हास्य पाहण्यासारखं आहे…बाळासाहेबही आता तीच उंची गाठताहेत..श्रोते क्षणभर स्तब्ध आणि मग टाळ्यांचा गजर…अखंड ! जा जा रे जा पथिकवा….आणि त्यावरून दयाघनाची याद आली ! म्हणून हे लिहिलं…)

(तपशीलात चुका आणि दीर्घ लेखनाचा दोष आहेच…दिलगीर आहे!)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक  !” भाग – २ —लेखक : श्री पार्थ बावसकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

(२३ जुलै १८५६ – १ अगस्त १९२०)

☆ “इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक  !” भाग –२ —लेखक : श्री पार्थ बावसकर ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

(“आई, या पावसाला आणि गर्दीला घाबरू नकोस! अगं, टिळकांकरिता खुद्द देवसुद्धा रडत आहेत. मा ! लुक हिअर, इव्हन गॉड इज वीपिंग फॉर मिस्टर टिलक!”) – इथून पुढे 

धुवाँधार बरसणाऱ्या पावसामुळे लोक ओलेचिंब झाले होते. रस्त्यावर चिखल झाला होता. माणसांची पांढरी धोतरे चिखलाने माखून काळीठिक्कर पडली होती. मुंबईच्या पारशी व्यापाऱ्यांनी विशेष व्यवस्था म्हणून चंदनाची चिता तयार केली होती. त्यावर टिळकांचे कलेवर ठेवण्यात आले, तोच त्या समुद्रकिनाऱ्यावरील लोकसागराला अचानक भरती आली. साखळ्या तोडून लोक टिळकांच्या चितेकडे धावत सुटले.

लोकमान्यांना अग्निडाग दिला आणि एका मुसलमान तरुणाचा धीरच सुटला. लोकमान्य गेले, आता आपण तरी जगून काय करायचे, असे म्हणून त्याने हंबरडा फोडला आणि त्याने चितेमध्ये उडीच घेतली. तो होरपळला गडगडत बाहेर फेकला गेला. त्याला दवाखान्यात नेले, पण काही दिवसांनी तोही लोकमान्यांच्याच वाटेवर निघून गेला.

संध्याकाळचे ७ वाजले तरीही त्याची शुद्ध कुणाला नव्हती. टिळकांच्या महानिर्वाणाचे हे दृश्य ‘याचि डोळा’

अनुभवणारे नाना कुलकर्णी लिहितात, “आम्ही त्या रात्री १० वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत पायावर उभेच होतो. अखेर शेवटचा घाला झाला. मन सुन्न झाले. हृदयात काय होत होते, हे सांगताही येईना. पावसाच्या धारा कोणत्या आणि अश्रूच्या धारा कोणत्या, हे समजेना, अग्निसंस्कार झाला, पण चौपाटीवरून पायच निघेना.”

जगभरातल्या अनेक वर्तमानपत्रांनी टिळकांना आदरांजली अर्पण केली. मृत्युलेख लिहिले, पण अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी लिहिलेला अग्रलेख त्यातला सर्वोत्तम. खरे तर टिळक जाण्यापूर्वी त्यांचे आणि टिळकांचे भांडण होते, तरीही टिळकांबद्दल असलेले अपार प्रेम संदेशकारांना अस्वस्थ करत होते. त्यांच्या लेखणीला शब्दांचा महापूर आला होता. या महापुरात ते फक्त टिळकांना शोधत होते आणि म्हणत होते,

” लोकमान्य, तुम्हाला आता कुठे पाहू? तुमची सावळी मूर्ती कुठे अवलोकन करू? तुम्हाला कुठे शोधू? तुम्हाला कुठे धुंडाळू? आमचा जीव तुमच्या जीवाशी गोठलेला होता. आमचा प्राण तुमच्या पंचप्राणांचा भाग होता. आमचे अस्तित्व तुमच्या अस्तित्वात गुरफटून गेले होते. आमचे जीवन तुमच्या जीवनात गुंतलेले होते. लोकमान्य! आता तुम्ही आम्हाला कुठे सापडाल? कुठे दिसाल? तुम्ही जात असताना आमच्या जीवनाला ओढणी लागलेली आहे. आमच्या प्राणांना क्लेष पडत आहेत. काट्याच्या जाळ्यावरून ज्याप्रमाणे रेशमी वस्त्राला फराफरा ओढावे, त्याप्रमाणे आमच्या हृदयाच्या चिरफाळ्या झालेल्या आहेत. लोकमान्य, आमचे प्राण तुमच्या स्वाधीन ! आमचे मन तुमच्या स्वाधीन ! आमचे जीवन तुमच्या स्वाधीन ! “

“ लोकमान्य, आम्ही, तुमचे तुम्ही आमचे आहात ! बोला, काय वाटेल ते सांगा, वाटेल ती आज्ञा करा, वाटेल तो हुकूम फर्मावा, आणि बोला, तुम्हाला कुठे शोधू? लोकमान्य, आम्ही तुम्हाला कुठे शोधू? आमचा वीर, हा आमचा हिरो, हा आमचा प्राण, हा आमचा लोकमान्य ! इतका सर्वव्यापी होता की, त्याने या महाराष्ट्रातील चर आणि अचर, सजीव आणि अजीव, सचेतन आणि अचेतन, इतकेच काय पण या महाराष्ट्रातील मानव, देव, किन्नर, विभूती या महाराष्ट्रातील साधू, संत, योगी, तपस्वी या महाराष्ट्रातील जल, स्थल, पाषाण, तरु, लता, उद्यान, पुरेपूर व्यापून टाकले होते. आमच्या लोकमान्या, लोकांच्या लोकमान्या, महाराष्ट्राच्या लोकमान्या, तुझ्याशिवाय जीवाला ओढणी का रे लागते। लोकमान्या, तुझ्याशिवाय जीव तुटतो रे।”

“ ४० वर्षांपर्यंत इथल्या जनतेला वेड लावणाऱ्या जादुगारा, लोकमान्या, यावेळी आम्हाला सोडून चाललास? जनतेच्या जनतानंदा या शोकसागरात आम्हाला लोटलेस? लोकांच्या प्रेमातील लोकमान्या, अश्रूच्या दर्यात आम्हाला टाकून दिलेस? देशबांधवांच्या कैवल्या, आम्हा सर्वांना विलाप करायला ठेवलेस? भारत देशाच्या कुलदीपक तिलका. आम्हास असाहय्य दीन, अनाथ केलेस? बोला, लोकमान्य बोला! राग टाकून बोला, पूर्वप्रेमाच्या सर्व स्मृतींनी बोला की, तुमच्या विरहावस्थेत या तुमच्या महाराष्ट्राने काळ कंठावा तरी कसा?…

कारण लोकमान्या, तू गेलास आज तुझ्याबरोबर महाराष्ट्राचा शिवाजी गेला आहे! तू गेलास, तुझ्याबरोबर महाराष्ट्राचा अर्जुन गेला आहे! लोकमान्य बाळ गंगाधर, तुम्ही गेलात ते तुमच्याबरोबर महाराष्ट्राची ज्ञानेश्वरी, महाराष्ट्राचे महाभारत, महाराष्ट्राचे रामायण, लुप्त होऊन गेलेले आहे! आम्ही हजारो प्राणी तुमच्या जागी नेण्यास योग्य होतो. पण, तुमचीच निवड करताना परमेश्वराने महाराष्ट्राचे कोणते हित पाहिले? “

त्या रात्री गर्दी ओसरल्यावर अनेकजण पुन्हा टिळकांच्या चितेजवळ गेले. त्यापैकी अनेकांनी टिळकांची ती राख एका पुडीत घेतली. ती पुडी हृदयाशी लावली. काहींनी चांदीच्या, सोन्याच्या डबीत तिला जन्मभर जपून ठेवले. टिळकांवर अंत्यसंस्कार जरी मुंबईत झाले, तरीसुद्धा पुढचे क्रियाकर्माचे संस्कार मात्र पुण्यातच पार पडले. १२ जुलै रोजी टिळक पुण्याहून मुंबईला निघाले होते, ते स्वतःच्या पायावर चालत. पण, आता ३ ऑगस्ट रोजी त्यांच्या अस्थी पुण्यात आणल्या जात होत्या स्पेशल ट्रेनने, फुलांच्या माळांनी सजवलेल्या चंदनाच्या पेटीत, एका चारचाकी रथात टिळकांच्या अस्थी पुण्यात आणल्या गेल्या.

केळकर लिहितात,

” जाताना ते आपल्या साडेतीन हात देहाने बाहेर पडले, पण येताना ते अंगुष्ठमात्र देहाने आले. जाताना त्यांनी अंगात नेहमीचा पोशाख घातला होता, येताना त्यांनी चिताभस्माचे रूप धारण केले होते. जाताना ते आपल्या पायांनी गेले, येताना ते एका वितभर चांदीच्या पेटीत निजून आपल्या परिचारकांच्या खांद्यावर बसून आले. जाताना त्यांचा सर्व ऐहिक व्याप त्यांच्या डोक्यात घोळत होता, येताना त्या सर्व व्यापांचा त्यांनी त्याग केलेला होता. जाताना ते वासनापूर्ण होते, येताना त्यांनी सर्व वासना टाकून दिल्या होत्या. जाताना ते लोकांविषयी बोलत होते, येताना त्यांनी स्वतः शाश्वत मौनव्रत स्वीकारले असून सर्व लोक मात्र त्यांच्याविषयी बोलत होते. जाता जाता त्यांनी टिळकपूर्ण असे पुणे सोडले, येताना त्यांनी टिळकशून्य अशा पुण्यात प्रवेश केला.”

ज्या दिवशी लोकमान्यांना तिलांजली देण्याचा विधी झाला, त्या दिवशी लोकमान्यांच्या पिंडाला कावळा लवकर स्पर्श करेना. पण, यात वेगळे काहीच नाही, असे म्हणत यावर अच्युत बळवंत लिहितात,

” टिळकांच्या पिंडाला स्पर्श कसा होणार? लोकमान्यांनी केलेल्या एवढ्या मोठ्या संकल्पात कोणकोणत्या इच्छा भरलेल्या होत्या? कोणकोणते बेत गूढ स्वरूपात होते? कोणकोणत्या योजना परत राहिलेल्या होत्या व कोणकोणत्या महत्त्वाकांक्षा अपुऱ्या राहिलेल्या होत्या, त्याचा शोध आता कसा लागणार? असा कोणता पराक्रमी पुरुष आहे की ज्याच्या सगळ्या इच्छा परिपूर्ण झालेल्या असतील? श्री शिवाजी महाराजांच्या सर्व इच्छा परिपूर्ण झालेल्या असतील काय? नर्मदातीरी वारलेल्या बाजीरावांच्या इच्छा परिपूर्ण झाल्या असतील का? सिकंदर किंवा पिटर दि ग्रेट इच्छा परिपूर्ण होऊन मेला असेल काय? आहो, पराक्रमी पुरुषांचे लक्षणच हे आहे की, त्यांच्या इच्छा कधीही पूर्ण झालेल्या नसतात. पराक्रमी लोकांच्या इच्छा भरधाव दौडीने धावत असल्याकारणाने त्या इच्छा परिपूर्ण करणे, हे एका आयुष्याला अशक्यच आहे! एका आयुष्यात इच्छा परिपूर्ण होतील तो कदाचित शहाणा असेल, पण पराक्रमी कधीही असणार नाही. आपल्या राष्ट्राचे अपरिमित वैभव इच्छिणारे जे लोकमान्यांसारखे पराक्रमी पुरुष असतात, त्यांच्या इच्छा अपरिमित असणे हेच त्यांना भूषण! आणि इच्छा अपरिमित असल्या की त्याची तृप्ती कुठून होणार? लोकमान्यांच्या पिंडाला काकस्पर्श लवकर झाला नाही, तो याच कारणामुळे होय.”

” टिळकांवर लोकांचे खरे प्रेम असेल तर ‘लोकमान्य’ ही पदवी त्यांनी अनंत काळापर्यंत अनन्यसामान्यच ठेवली पाहिजे. ‘लोकमान्य’ या शब्दाने यापुढील हिंदुस्तानच्या इतिहासात कोणाही कितीही मोठ्या व्यक्तीचा उल्लेख होता कामा नये.” 

केळकरांनी ही अपेक्षा व्यक्त करून १०० वर्ष झाले. टिळक जाऊन १०० वर्ष झाले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी केलेली ती सिंहगर्जना त्यांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने पुन्हा एकवार आठवावी, आळवावी या हेतूने केलेले हे टिळकांच्या सिंहगर्जनेचे सिंहावलोकन !

लोकमान्य म्हणजे बाळ गंगाधर टिळक हे समीकरण इथून पुढेही जोवर मराठी भाषा जिवंत असेल, तोवर टिकून राहो, लोकमान्यांच्या विचारांना कृतिशीलतेची पावले लाभोत आणि टिळकांचे विचार चिरंजीव होवोत, या चिमण्या प्रार्थनेसह ‘सिंहगर्जनेचे सिंहावलोकन’ इथेच पुरे करतो… 

– समाप्त –

लेखक : श्री पार्थ बावसकर 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ११ — विश्वरूपदर्शनयोग — (श्लोक ३१ ते ४०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ११ — विश्वरूपदर्शनयोग — (श्लोक ३१ ते ४०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

*

आख्याहि मे को भवानुग्ररूपोनमोऽस्तु ते देववर प्रसीद ।

विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यंन हि प्रजानामि तव प्रवृत्तिम्‌ ॥३१॥

*

कसले हे उग्र रूप आपले देवश्रेष्ठा नमन तुला

प्रसन्न व्हा आदिपुरूषा दावी गुण ना तव रूपाला ॥३१॥

श्रीभगवानुवाच

कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धोलोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः ।

ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ॥३२॥

कथित श्री भगवान

महाकाल मी नाशकर्ता तिन्ही लोकांचा

या समयाला या योद्ध्यांचा अंत व्हायाचा

शस्त्रसज्ज होउनी होई युद्धाभिमुख पार्थ

तव कर्माविनाही यांचा नाश आहे खचित ॥३२॥

*

तस्मात्त्वमुक्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून्भुङ्‍क्ष्व राज्यं समृद्धम्‌ ।

मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्‌ ॥३३॥

*

जिंकण्यास शत्रूला समरी यशःप्राप्ति करण्या 

युद्धास्तव उत्तिष्ठ भवान समृद्ध राज्य भोगण्या

तू तर केवळ कारण होशिल वीरांच्या या मृत्यूचा

सव्यसाची हे केला मीच अंत तयांच्या जीवनाचा ॥३३॥

*

द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथान्यानपि योधवीरान्‌ ।

मया हतांस्त्वं जहि मा व्यथिष्ठायुध्यस्व जेतासि रणे सपत्नान्‌ ॥३४॥

*

द्रोण भीष्म जयद्रथ कर्णादि वीरांचा मम हस्ते अंत

साधन होउनिया माझे युद्धात करी तू त्यांचा अंत

विजयी होशिल या समरात हाचि कालाचा लेख

शंकित होउनिया मानसी होई ना तू युद्धपराङ्मुख ॥३४॥

संजय उवाच

एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृतांजलिर्वेपमानः किरीटी ।

नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णंसगद्गदं भीतभीतः प्रणम्य ॥३५॥

कथित संजय

ऐकुनिया ही केशववाणी अर्जुन भयभीत

प्रणाम करता झाला कृष्णा कंपित जरी हस्त

लीन होउनी पूरभु चरणांसी भावभरा तो स्वर 

व्यक्त करोनी भाव आपुले कथिता होई सत्वर ॥३५॥

अर्जुन उवाच

स्थाने हृषीकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च ।

रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्‍घा: ॥३६॥

*

मुदित होतसे तुझ्या कीर्तने  इहलोक समस्त

धन्य जाहले तव अनुराग तयांस होता प्राप्त

समग्र सिद्धसमुदाय होत तव चरणांवर नत

असूर सारे करित पलायन होउनिया भयभीत ॥३६॥

*

कस्माच्च ते न नमेरन्महात्मन्‌ गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे ।

अनन्त देवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत्तत्परं यत्‌ ॥ ३७ ॥

*

ब्रह्माचे आदिकर्ता अनंत सर्वश्रेष्ठ महात्मन

सदसत्परे अक्षर  देवेश ब्रह्म सच्चिदानंदघन 

तव चरणी लीन होउनी सर्वस्वाचे समर्पण 

शरण पातलो हे भगवंता तुम्हासी करितो नमन ॥३७॥

*

त्वमादिदेवः पुरुषः पुराणस्त्वमस्य विश्वस्य परं निधानम्‌ ।

वेत्तासि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वमनन्तरूप ॥३८॥

*

आदिदेवा पुराणपुरुषा संरक्षण करुनी पाळता  तुम्ही या विश्वाला

अनन्तरूपी हे परमेशा परिपूर्ण अहात व्यापुनी अखिल जगताला ॥३८॥

*

वायुर्यमोऽग्निर्वरुणः शशाङ्‍क: प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च।

नमो नमस्तेऽस्तु सहस्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते ॥३९॥

*

अनल अनिल वरुण सोम प्रजापति ब्रह्मा ब्रह्मपिता

पुनःपुनः सहस्रावधी नमन तुम्हा चरणी हे जगत्पिता ॥३९॥

*

नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व। 

अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वंसर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः ॥४०॥

*

आदि ना अंत तव सामर्थ्या अष्टदिशांनी नमन तुम्हा

विश्वव्यापी सर्वरूपी अतिपराक्रमी प्रणाम असो तुम्हा ॥४०॥

 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares