मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १३ — क्षेत्रक्षेत्रज्ञ योग — (श्लोक ११ ते २0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १३ — क्षेत्रक्षेत्रज्ञ योग — (श्लोक ११ ते २0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

*

अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् ।

एतज्ज्ञानमिति प्रोक्तमज्ञानं यदतोऽन्यथा ॥ ११ ॥

*

अध्यात्मज्ञान नित्य तत्वज्ञान परिशीलन

गुण हे ज्ञान अन्य विपरित ज्ञान केवळ अज्ञान ॥११॥

*

ज्ञेयं यत्तत्प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वाऽमृतमश्नुते ।

अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते ॥ १२ ॥

*

अनादि सत्असत् ना सर्वश्रेष्ठ ब्रह्म ज्ञेय 

कथितो तुजला मोक्षदायी हे अमृत ज्ञेय ॥१२॥

*

सर्वतः पाणिपादं तत्सर्वतोऽक्षिशिरोमुखम् ।

सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति ॥ १३ ॥

*

सर्वत्र तया हस्तपाद नेत्र शिरे आनन

कर्णही सर्व बाजूंनी सर्वांसी व्यापून ॥१३॥

*

सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् ।

असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च ॥ १४ ॥

*

भास सर्व इंद्रियांचा गात्र तया नसून

असक्त सकलांपासून भूत धारणपोषण

भासती सर्व गुण परी ते सर्वस्वी निर्गुण

समग्र गुणांचे ते भोक्ते असूनिया निर्गुण ॥१४॥

*

बहिरन्तरश्च भूतानामचरं चरमेव च ।

सूक्ष्मत्वात्तदविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत् ॥ १५ ॥

*

सर्वभूतांतरी बाहेरी चल तसेची ते अचल

सूक्ष्म जाणण्यासि दूर परी भासते जवळ ॥१५॥

*

अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितम् ।

भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च ॥ १६ ॥

*

ब्रह्म असूनी अखंड भासते सर्वभूतात विभक्त 

भूतधारकपोषक नाशक तथा तेचि जन्मद ॥१६॥

*

ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते ।

ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य धिष्ठितम् ॥ १७ ॥

*

ब्रह्म हे तेजांचे तेज तमाच्याही सीमेपार

हृदयात ज्ञानरूप ज्ञेयरूप ज्ञाने उमगणार ॥१७॥

*

इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः ।

मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते ॥ १८ ॥

*

ऐसे आहे संक्षिप्ताने ज्ञान तथा ज्ञेय

ज्ञानाने या मम भक्त मम स्वरूपी होय ॥१८॥

*

प्रकृतिं पुरुषं चैव विद्ध्यनादि उभावपि ।

विकारांश्र्च गुणांश्र्चैव विद्धि प्रकृतिसंभवान् ॥ १९ ॥

*

प्रकृती पुरुष उभयता तया अनादि जाण

विकारास तथा गुणास प्रकृती असे कारण ॥१९॥

*

कार्यकारणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते ।

पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते ॥ २० ॥

*

कार्य-कारण-कर्तृत्वास मूळ प्रकृती कारण

भोगांस सुखदुःखांच्या मूळ पुरुष कारण ॥२०॥

 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ देवाचं देणं… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ देवाचं देणं… ☆ श्री सुनील शिरवाडकर

तो एक लेखक होता. मराठी कादंबरीकार. १९७० ते १९९० हा त्याचा लेखनकाल. या काळात त्याने साधारण हजार कादंबऱ्या लिहिल्या. त्याचा खप अक्षरशः तडाखेबंद होता. ‘अश्लील कादंबरीकार ‘ म्हणुनच त्याची ओळख होती. पण त्याने कधी पर्वा केली नाही.

जन्म सांगलीचा. सुरुवातीच्या काळात त्याने काही मासिकं काढली. नट नट्यांची लफडी.. आणि त्याला साजेशी चित्रे असं त्यांचं स्वरुप असायचं. मासिकाची नावही तशीच.. राणी.. प्यारी.. मस्ती अशी.

ही माहिती तो कुठुन गोळा करायचा ते कधीच समजलं नाही. मासिकांवर त्याने टाकलेले पत्ते नेहमी खोटेच असायचे. तो नेमका कुठं रहातो.. अंक कुठून प्रकाशित करतो.. प्रिंट कुठून करतो हे कधीच समजायचं नाही.

पण त्यांची विक्री अफाट होती‌. महाराष्टातील सगळीच रेल्वे स्टेशन.. बस स्टॅण्ड.. आणि गावागावांत असलेले विक्रेते एजंट अंकाची आतुरतेने वाट पहात. आलेले अंक हातोहात खपत. कधी दुप्पट तिप्पट किमतीतही ती विकली जात.

काही काळ हा उद्योग चालला.. आणि मग बंदही पडला. मग त्यानं कादंबरी लेखन सुरू केलं. त्याच्या कादंबऱ्या म्हणजे रहस्यकथा असत. त्या नावाखाली पानोपानी कामुक वर्णने.. जोडीला खुन. दरोडे.. बदले हा मसाला.

त्याच्या लेखनाचा झपाटा विलक्षण होता. महीन्यात २०-२५ कादंबऱ्या सहजपणे तो लिहून काढायचा.

एक बाहेरगावचा प्रकाशक त्याच्याकडं आला होता…. कबुल करुनही अजुन का कादंबरी लिहीली नाही म्हणून जाब विचारण्यासाठी.

त्याने मग स्वतःला खोलीत कोंडुन घेतलं. दुपारपासुन तर रात्रीपर्यंत अखंड लेखन करुन कादंबरी त्या प्रकाशकांच्या हातात ठेवली.

याच काळात आशु रावजी.. दिनु कानडे या नावांनी लिहिलेल्या अश्लील कादंबऱ्या पण वाचकांमध्ये गाजत होत्या. हे दोन लेखक कोण हे कधीच समजलं नाही. पण बऱ्याच जणांच्या मते ह्या कादंबऱ्या तोच टोपण नावाने लिहीत होता.

त्यानं लेखन सहायक म्हणुन सुंदर मुलींचा तांडाच ठेवला होता. पुण्यात आल्यावर त्याला भेटायला गर्दी लोटे.

सुहास शिरवळकर एकदा त्याला भेटायला गेले होते. तो पुण्यात एका आलिशान हॉटेलमध्ये उतरला होता. त्याला भेटायला आलेल्या प्रकाशकांची गर्दी.. त्याच्या सेवेत असलेल्या सुंदर ललना.. आणि मद्याचा महापूर हे सगळं बघुन ते चकीतच झाले. ‘सु. शि. ‘सांगतात… या माणसाकडे पाहील्यावर एक गोष्ट लक्षात आली. या माणसानं आयुष्य खुप ‘उपभोगुन’ घेतलं आहे.

या अश्या लिखाणामुळे त्याच्या मागे कोर्ट कचेरी खटले मागे लागले. एक वेळ तर अशी होती की ऐंशी खटले त्यांच्यावर दाखल झाले होते.. मग त्यानं एक कायमस्वरूपी वकील पगारावर ठेवला.

जितका पैसा त्यानं मिळवला.. तो सगळा दारु.. स्त्रिया.. कोर्ट.. आणि पोलिसांची सरबराई यात घालवला. ऐषोरामी जीवन. ‌विलासी जगणं यात आलेली कमाई उधळली.

सुभाष शहा हे या लेखकांचं नाव. त्यांची पुस्तक वाचणं.. अगदी उघडपणे बाळगणं हेही अप्रतिष्ठतेचं.. अभिरुचीहिनतेचं लक्षण मानलं जातं होतं. तरीदेखील लपुन छपुन सगळेचं जण सुभाष शहांच्या पुस्तकांकडे आकर्षित होत असत.

पण या सगळ्याला उतरती कळा लागणं नैसर्गिक होतं. काळ बदलला.. लोकांच्या आवडी बदलल्या.. करमणुकीची साधनं बदलली.. त्यांच्या पुस्तकांचा खप खाली आला. दारु.. व्यसनं करता करता पैसा संपत गेला. शरीर पोखरत गेलं. देवानं सुभाष शहांना अपार प्रतिभा बहाल केली होती. लेखन शैली असुनही त्यांनी ती चुकीच्या कामांसाठी वापरली. त्यांना कधी मानसन्मान मिळालेच नाही. स्वत:च्याच अश्या सवयींमुळे एक उमदा लेखक संपून गेला.

या पार्श्वभूमीवर आठवतात लेखक रवींद्र पिंगे.. आणि त्यांचे विचार. ते म्हणतात..

“पन्नास वर्षे मी जीव लावून गोमटं आणि घाटबध्द लेखन केलं. दैवानं जे काही आणि जेवढं आपल्या ओंजळीत टाकलं, तेवढंच आपलं असतं. अधिकासाठी जीव पाखडायचा नाही. माझं मन नेहमीच वखवखशुन्य असतं. जे सुखदुःख मिळालं ते भोगलं.. तक्रार नाही. माझी ठाम श्रद्धा आहे की..

… माणसानं दिलेलं पुरत नाही..

आणि..

देवानं दिलेलं सरत नाही.

पोएट बोरकरांच्या भाषेतच सांगायचं तर..

.. वळुन पाहता मागे..

.. घडले तेच पसंत

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ महर्षि बालखिल्य… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? इंद्रधनुष्य ?

☆ महर्षि बालखिल्य… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

महर्षी बालखिल्य हे महर्षी कृतु आणि सन्नीता यांचे पुत्र. प्रजोत्पादनासाठी आणि तपस्या करण्यासाठी महर्षी कृतु यांनी आपल्या केसांपासून त्यांना निर्माण केले. ते साठ हजार होते. त्यांचा आकार अंगठ्या इतका लहान होता. ते सूर्याचे उपासक होते. ते सूर्य लोकात रहात. पक्षांप्रमाणे एक एक दाणा वेचून ते आपला उदरनिर्वाह करत असत. ते सदैव सूर्याकडे तोंड करून फिरत असत. त्यांच्या तपस्येचे तेज सूर्याला मिळत असे. ते सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट रेडियमच्या तीव्रतेपासून जगाचे संरक्षण करीत असत.

बालखिल्य हा दैवी ऋषींचा समूह आहे. ते शरीराने लहान पण तपस्वी म्हणून महान आहेत.

एकदा महर्षी कश्यप यांनी यज्ञ करण्याचे ठरवले. त्यांनी कृतु ऋषींना सांगितले तुम्ही माझ्या यज्ञात ब्रह्माचे स्थान ग्रहण करा व आपल्या सर्व पुत्रांना घेऊन या. महर्षी कृतुंनी आमंत्रण स्वीकारले. देवराज इंद्रही त्या ठिकाणी होते. महर्षी कश्यप यांनी सर्वांना यज्ञासाठी समिधा आणण्यास सांगितले. इंद्राने खूप समिधा आणल्या. पण बालखिल्य थोड्याच समिधा आणू शकले. इंद्राने चेष्टा केली. विचारले, हे वीतभर लाकूड घेऊन कशाला आलात? हा यज्ञ तुमच्या आकाराप्रमाणे छोटा असेल असे तुम्हाला वाटले का? बालखिल्ल्यांना उपहास समजला. तरीही कश्यप ऋषींसाठी शांत राहून ते म्हणाले, “आम्ही यज्ञासाठी समिधा आणल्या आहेत. त्यांच्या आकाराकडे न पाहता आमचा समर्पण भाव पहा. ” इंद्र म्हणाला, “ तुम्ही देवराज इंद्राशी बोलत आहात लक्षात आहे का? “ 

बालखिल्यांना खूप राग आला. इंद्राला धडा शिकवण्यासाठी ते म्हणाले, “ तुला इंद्रपदाचा गर्व आहे‌ म्हणून आम्ही संकल्प करतो की आम्ही आमच्या योगबलाने तुमच्यापेक्षा कैक पटीने शक्तिशाली, बुद्धिमान आणि सद्गुणी इंद्र निर्माण करू. ” इंद्र घाबरून कश्यपांकडे गेला. कश्यपांनी बालखिल्यांची समजूत घातली व सांगितले, “ जगात इंद्र एकच असणार तेव्हा त्याला क्षमा करा. ” बालखिल्यांना आपला संकल्प परत घेणे कठीण होते. ते म्हणाले, “ आम्ही संकल्प परत घेऊ शकत नाही. पण बदल करू शकतो. तुम्ही पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करत आहात. तुमचा पुत्र अतिशय पराक्रमी, शक्तिशाली असा प्राणी असेल जो पक्षांचा इंद्र होईल. आमचा संकल्पही पूर्ण होईल आणि इंद्र पदाचे महत्व ही कमी होणार नाही. ” 

कश्यपांची पत्नी विनता हिने गरुडाला जन्म दिला आणि गरुड भगवान विष्णूचे वाहन बनले. तसेच त्याला पक्षांचे इंद्र असे नाव पडले.

त्यांनी बालखिल्य संहिता रचली. ते केदारखंडमध्ये तपस्या करीत होते. तिथे एक नदी आहे तिचे नाव बालगंगा.

ऋग्वेदाच्या आठव्या मंडलाच्या शेवटी एक परिशिष्ट आहे. त्याला बालखिल्यसूक्त असे म्हणतात.

एकदा गरुडाला खूप भूक लागली. त्याने वडिलांना विचारले, ‘ मी काय खाऊ?’ तेव्हा ते म्हणाले, “समुद्रात एक मोठे कासव आहे आणि वनामध्ये एक महाभयंकर हत्ती आहे. दोघेही खूप क्रूर आहेत. तू त्यांना खा. ” गरुडाने दोघांना पकडले व तो सोमगिरी पर्वतावर गेला. तिथे एका उंच वृक्षावर काही ऋषी उलटे लटकून तपस्या करत होते. गरुड त्याच फांदीवर बसला. त्याच्या वजनाने ती फांदी तुटू लागली. गरुडाने आपल्या चोचीत ती फांदी पकडली आणि कश्यप ऋषींकडे आला. कश्यप ऋषी म्हणाले, “ हे बालखिल्य ऋषी आहेत. त्यांना त्रास दिलास तर ते शाप देऊन तुला भस्म करतील. ” गरुडाला वाचवण्यासाठी त्यांनी बालखिल्य ऋषींना प्रार्थना केली की ‘ तुम्ही फांदीवरून खाली या. ’ बालकिल्ल्यांनी कश्यपांची प्रार्थना ऐकली. ते खाली आले आणि हिमालयात तपस्या करण्यासाठी निघून गेले.

असे हे आकाराने लहान पण कर्तृत्वाने महान असे तपस्वी बालखिल्य ऋषी. त्यांना कोटी कोटी प्रणाम.

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डॉ. इरावती कर्वे… लेखक : श्री बी. एस. जाधव ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

 ☆ डॉ. इरावती कर्वे… लेखक : श्री बी. एस. जाधव ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

डॉ. इरावती कर्वे

“ए दिनू मी जाते” अशी नवऱ्याला शंभर वर्षापूर्वी हाक मारणारी – – 

थोर समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, चिकित्सक संशोधक, लेखिका डाॕ. इरावतीबाई कर्वे यांचा ११ ऑगस्ट हा स्मृतीदिन आहे. महाराष्ट्राला ज्यांचा विसर पडला आहे अशा अनेक विद्वान व्यक्तीपैकी डाॕ. इरावतीबाई कर्वे याही एक आहेत. पुण्याच्या फर्ग्युसन काॕलेजचे प्राचार्य डाॕ. दिनकर धोंडो कर्वे यांच्या त्या पत्नी व महर्षि धोंडो केशव कर्वे यांच्या स्नूषा आहेत.

बाईंचा जन्म म्यानमार येथे १५ डिसेंबर १९०५ रोजी झाला. वडीलांचे नाव गणेश हरी करमरकर व आईचे नाव भागीरथीबाई होते. वडील म्यानमारमधील एका कंपनीत नोकरी करीत होते. मूळचे हे कुटुंब कोकणातले आहे. त्यांना पाच भाऊ होते. म्यानरमधील इरावती नदीवरुन त्यांचे नाव “इरावती” असे ठेवले. कुटुंबात त्यांना माई म्हणत. विद्यार्थी व मित्रपरिवारात त्यांना आदराने “बाई” असे म्हटले जायचे.

लालसर गोरापान रंग, उंच, धिप्पाड देहयष्टी, रसरसशीत कांती. ठसठशीत कुंकू. घट्ट बुचडा, नऊवारी साडी, निळ्या, निळ्या डोळ्यात चमकणारे प्रचंड बुध्दीचे तेज असे त्यांचे सुंदर व अत्यंत विलोभनीय व्यक्तीमत्व होते. पुण्यातील रस्त्यावरुन १९५२च्या सुमारास भरधाव वेगाने स्कूटर चालवीत डेक्कन काॕलेजकडे जाणाऱ्या या महान विदूषीकडे अवघे पुणेकर कुतूहलाने व आदराने पाहत असत.

वयाच्या सातव्या वर्षी हुजूरपागा शाळेत त्यांना दाखल केले. आणि मग त्या कायमच्या पुणेकर झाल्या. १९२२ साली त्या मॕट्रिक झाल्या. १९२६ साली फर्ग्युसन काॕलेजमधून त्या तत्वज्ञान विषय घेऊन बी. ए. झाल्या. आणि त्याचवर्षी त्यांचा फर्युसन काॕलजचे प्राध्यापक दिनकर धोंडो कर्वे यांच्याशी प्रेमविवाह झाला. १९२८ साली त्या एम. ए. झाल्या. त्याचवर्षी महर्षि कर्व्यांचा विरोध असताना त्या अट्टाहासाने पी. एचडी करण्यासाठी जर्मनीला गेल्या. १९३० साली “मानवी कवटीची अरुप प्रमाणता”(A semetry of human skull) या विषयात त्यांना पी. एचडी मिळाली. तत्कालीन काळात स्त्रिया पदवीधर होणे हेच अवघड होते. बाई तर परदेशात जाऊन पी. एचडी. होऊन आल्या होत्या. पुण्यात त्यावेळी ही अपुर्वाईच होती. काही काळ त्यांनी एसएनडीटी विद्यापीठात कुलसचिव पदावर काम केले. व नंतर त्यांनी डेक्कन काॕलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी केली. संशोधन हे त्यांचे आवडीचे क्षेत्र होते. त्यामध्ये त्या रमून गेल्या. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांना फर्ग्युसन काॕलेजचे प्राचार्य रँग्लर र. पु. परांजपे यांचा सहवास लाभला होता. त्यांच्या घरीच त्या राहत होत्या. या विद्वान, ऋषितुल्य गुरुंचे संस्कार बाईंच्या व्यक्तीमत्वात गडदपणे ऊमटले. संशोधन, चिकित्सा, साहित्य, काव्य यांची अभिरुची त्यांच्या संस्कारात निर्माण झाल्या.

संशोधक हा त्यांचा मूळ पिंडच होता. संशोधन करण्यासाठी सारा भारतभर त्या फिरल्या. जगभर प्रवास केला. मानववंशशास्त्र व समाजशास्त्र यामध्ये त्यांनी आयुष्यभर संशोधन केले. अखंड वाचन केले. शंभरहून अधिक संशोधनपर लेख लिहिले. जगभर व्याख्याने दिली. त्यांचे सारे लेखन चिंतनगर्भ आहे. चिकित्सा करतानाही अत्यंत सहृदयपणे विवेचन त्यांनी केले आहे. हिंदू समाजरचना, हिंदू समाज एक अन्वयार्थ, महाराष्ट्र अँड इटस् पीपल, किनशीप आॕरगनायझेशान इन इंडिया(नातेदारी संबध)असे पुष्कळ वैचारिक व संशोधनात्मक त्यांनी लेखन केले आहे. Kiniship organization in India या ग्रंथाने त्यांना जगप्रसिध्द कीर्ती मिळवून दिली. नात्यासंबधी शब्द, त्यांचा अभ्यास व स्त्रियांच्या प्रश्नासंबंधी त्यांचे लेखन वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. रुढअर्थाने त्या स्त्रीवादी नाहीत. परंतु त्यांच्या वैचारिक चिंतनातून आपसूकच स्त्रीवादी विचार प्रसवले आहेत. हे त्यांचे हवे तर द्रष्टेपण म्हणता येईल. स्रिया पुरुषाबरोबर समानतेचे हक्क मागतात. इरावतीबाईंनी स्त्रियांना समानतेचे हक्क काय मागता तर समानतेपेक्षा जास्तच मागा असे सांगितले. त्यांचे सासरे महर्षि कर्वे यांनी स्त्रियांच्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ काढले. परंतु इरावतीबाईंनी महिलासाठी वेगळ्या विद्यापीठाची गरजच नाही असे म्हटले. त्यांना पुरुषांच्या बरोबरीने शिकू द्या असे सांगितले.

इरावतीबाईनी मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, धर्म, संस्कृती याविषयी वैचारिक आणि संशोधनात्मक लेखन केलेच शिवाय त्यांनी जे ललित लेखन केले आहे ते फारच ऊच्च दर्जाचे केले आहे. महाराष्ट्र संस्कृती त्यांच्या लेखनात ऊमटली आहे. त्यांच्या वैचारिक लेखनामुळे त्यांचे ललित लेखनही विलक्षण टापटिपीचे व हृदयगंम झाले आहे. “युगांत” मधील व्यक्तीरेखाने त्यांना मराठी साहित्यात अढळ स्थान प्राप्त करुन दिले आहे. महाभारतील गूढ व्यक्तीमत्वाचा शोध त्यांनी मानवंशशास्त्र व समाजशास्त्रीय अनुबंधाने घेतला आहे. हे पुस्तक वाचताना आपण देहभान विसरतो. भोवरा, युगान्त, परिपूर्ती असे पुष्कळसे ललित लेखन त्यांनी केले आहे. परिपूर्ती या पुस्तकात परिपूर्ती या शिर्षकाचा लघुकथेच्या अंगाने जाणारा त्यांचा आत्मलेख आहे.

एका समारंभात बाईंची ओळख करुन देताना अमक्याची सून, अमक्याची मुलगी, अमक्याची पत्नी अशी करुन दिली. समारंभ संपला. बाई घरी चालल्या. परंतु त्यांचे मन विलक्षण अस्वस्थ होते, मन सैरभैर झाले होते. त्यांना कसले तरी अपुरेपण जाणवत होते. काहीतरी हरवल्यासारखे वाटत होते. याच विचारात त्या घरी चालल्या होत्या. वाटेत मुलांचा खेळ चालला होता. बाईंना पाहताच एक मुलगा मोठ्याने ओरडून म्हणाला, “अरे!शूः शूः त्या बाई पाहिल्यास का? त्या बाई जात आहेत ना, त्या आपल्या वर्गातल्या कर्व्याची आई बरं का”. एवढ्या गलक्यातून ते वाक्य ऐकताच बाई चपापल्या. त्यांचे डोळे आनंदाने चमकू लागले. आता त्यांना काहीतरी हरवले होते ते गवसले होते. मनाची परिपूर्ती झाली होती. समारंभातील अपूरी ओळख आता पूर्ण झाली होती. ” आधीच्या परिचयात प्रतिष्ठा होतीच. “कर्व्याची आई”या शब्दाने प्राणप्रतिष्ठा झाली.

खरेतर बाईनी ही गोष्ट उपहासाने लिहिली होती. स्त्री कितीही कर्तबगार झाली तरी ती कोणाची मुलगी, कोणाची सून, कोणाची पत्नी अशीच असते, तिला स्वतःची वेगळी ओळख नसते. हे त्यांना सांगायचे होते. परंतु कर्व्याची आई ही त्यांची ओळख त्यांना जीवनाची परिपूर्ती वाटून गेली.

त्यांचे सारे ललित साहित्य असेच अंतर्मुख करणारे आहे. मनाचा तळ ढवळून काढणारे आहे. वैचारिक घुसळण करणारे आहे. एवढ्या विद्वान बाई, इंग्लिश सहीत अनेक पाश्चात्य भाषा अस्खलित बोलणारी पंढरपूरची वारी करते याचे मराठी माणसाला केवढे अप्रुप वाटायचे. अगोदर ऊंच असलेल्या बाई आणखी ऊंच वाटू लागायच्या. प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या निकषावर घासून घेणारी ही बुद्धीप्रामाण्यवादी, प्रचंड विद्वान बाई वारीत सामील व्हायच्या. भक्ती आणि ज्ञान याचा केवढा हा मनोज्ञ संगम ! विद्वतेची, पांडित्याची भरजरी वस्त्रे बाजुला सारुन फाटक्या तुटक्या, दीन- बापुड्या गरीब वारकऱ्याबरोबर पांडुरंगाच्या ओढीने पंढरीला जाणारी ही पहिलीच भारतीय उच्चविद्याविभूषित विदूषी आहे.

बाईंना फक्त ६५ वर्षाचे आयुष्य लाभले. ११ आॕगस्ट १९७० रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले. परंतु एवढ्या आयुष्यात कोणी शंभर वर्षे जगून होणार नाही एवढे संशोधन व वैचारिक लेखन केले, खूप भ्रमंती केली. खूप व्याख्याने दिली. परदेशात लौकीक मिळविला. शंभर वर्षांपूर्वी स्त्री असल्याचा कोणताही अडसर न मानता विद्वत्तेच्या उंच शिखरावर विराजमान झाल्या. सनातनी पुण्यातल्या भर रस्त्यावर भरधाव वेगाने स्कूटर चालवणारी, फर्ग्यूसन काॕलेजच्या प्राचार्य असलेल्या आपल्या नवऱ्याला “ए दिनू मी जाते रे” अशी एकेरी बोलणारी … या महाराष्ट्राच्या विद्वान सुपुत्रीला त्यांच्या ५४ व्या पुण्यतिथी निमित्य साष्टांग दंडवत.

लेखक : श्री. बी. एस. जाधव

संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सुखी व्हायचं आहे का ? मग — लेखक – श्री धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ सुखी व्हायचं आहे का ? मग — लेखक – श्री धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

“कर्मा रिटर्न्स” हे विसरू नका !

एका सुंदर शहरात छान बंगल्याची एक कॉलनी होती. त्या कॉलनीत एक बंगला बरेच दिवस रिकामा असतो. त्यामुळे शेजारच्या बंगल्यातील मंडळी त्यांच्या बागेतला कचरा रात्री हळूच या बंद असलेल्या बंगल्याच्या आवारात टाकून देत असत. त्यामुळे तिथं कचऱ्याचा भला मोठा ढीग साचलेला. 

अशातच एक दिवस त्या बंद बंगल्यात एक तरुण जोडपं राहायला येत. कंपाउंड दार उघडून ते आत येताच समोर हा कचऱ्याचा ढीग दिसतो. ती चिडते, वैतागते. हे असं कुणी केलं असेल यावर तडफड व्यक्त करते. तो मात्र शांत असतो. तिला “आधी आत तर जाऊया” असं हसून म्हणत तिला आत घेऊन येतो. येतानाच बाहेरून जेवून आल्याने आता हाताशी वेळ असतो. तर तो तिला म्हणतो, “गॅलरी त्यातल्या त्यात स्वच्छ दिसतेय तर तू  तिथं थोडा आराम कर” असं म्हणून तिला तिथं बसवून हा पठया हातात झाडू घेऊन आधी पूर्ण घर साफ करतो. नंतर बागेत येतो. तिथला कचऱ्याचा ढीग नीट एका कोपऱ्यात नेतो. बागकामासाठी लागणारी हत्यारे तिथेच बागेत एका छोट्या कपाटात असतात. त्यातून तो कुदळ फावडे घेऊन एक छोटा खड्डा तयार करतो. त्यात हा कचरा टाकून वरती थोडी माती व पाणी शिंपडून खड्डा बंद करतो. 

नंतर पाईप घेऊन त्याने पूर्ण बागेच्या परिसरात मस्त पाणी मारतो. मरगळलेली ती झाडे आता एकदम तरारून येतात. जमिनीवरची हिरवळ देखील जणू खुश होऊन डोलू लागते. एक प्रकारचं चैतन्य तिथं अवतरत. अन त्याच्या लक्षात येतं की बागेत मस्त आंब्याचे, चिकूचे, पेरूचे झाडे आहेत. त्या झाडाला मग तो थोडं पाणी टाकून ठेवतो. 

*

हे करता करता संध्याकाळ होते. तोही थकून गेलेला असतो. तोवर ती हि आतून बाहेर येते. म्हणते, “मी आतलं सामान बऱ्यापैकी लावलं आहे. मात्र आता किचनचा कंटाळा आलाय रे”

तो म्हणतो, “हरकत नाही, आपण बाहेर जाऊया. थोडं फिरणं पण होईल अन येताना खाऊन येऊ”

त्याप्रमाणे दोघे तयार होऊन बाहेर जातात. 

त्या दरम्यान शेजारच्या त्या बंगल्यातले लोक तोवर हे सगळं पाहत असतात. मात्र रोजच्या सवयीने रात्रीच्या अंधारात ते स्वतःचा कचरा या स्वच्छ केलेल्या बंगल्यात टाकतात. अन दार बंद करून आत बसतात. 

हे तरुण जोडपं जेव्हा फिरून खाऊन घरी येत तर दिसत की पुन्हा शेजारच्यांनी कचरा टाकला आहे. ती आता मात्र खवळते. “मी बघतेच त्यांच्याकडे” असं म्हणून ती शेजारी जायला निघणार इतक्यात तो तिला थांबवतो अन हसून म्हणतो, “तू आत जा. बाकी सोड माझ्यावर”

असं म्हणून तिला आत पाठवून तो पुन्हा खराटा घेऊन तो कचरा गोळा करून त्या दुपारी केलेल्या खड्ड्यात टाकून पाणी टाकून ठेवतो. 

*

असे रोजच होऊ लागते. शेजारचे अंधाऱ्या रात्री कचरा टाकून जात अन हा खराटा घेऊन तो खड्ड्यात टाकून ठेवत असे. हळूहळू त्या खड्ड्यातील कचऱ्याचे मस्त सेंद्रिय खत तयार होते. ते खत तो बागेतल्या फळझाडांना टाकत राहतो. त्यामुळे लवकरच त्या झाडाला मस्त फळे येतात. 

अन त्या दिवशी तो एक धमाल निर्णय घेतो. 

नेहमीप्रमाणे रात्री शेजारचे कचरा टाकून जातात. तो हा कचरा गोळा करून शोष खड्ड्यात टाकतो. अन सकाळी उठल्यावर त्या बागेतली झकास अशी तयार झालेली फळे तोडून एका टोपलीत भरून ती टोपली घेऊन शेजारच्या घरी जातो. बेल वाजवतो. आतून तिथली मंडळी पिप होलमधून पाहतात तर हा तरुण दिसतो. ते शेजारी गडबडतात की आता भांडायला आला की काय ? असं म्हणून ते भांडणाच्या तयारीत दार उघडतात तर समोर हा तरुण हसतमुखाने हातातली फळाची टोपली त्या शेजार्याला देतो. 

शेजारी चकित होतो. शेवटी ओशाळून तोच म्हणतो की, “आम्ही रोज कचरा टाकत होतो तरी तुम्ही भांडण करत नाहीत तर उलट आम्हालाच फळे द्यायला आलात. हे कसे काय?”

तर तो तरुण म्हणाला, 

ज्याच्याकडे जे असते ते तो देत असतो.

तुमच्याकडे कचरा होता तो तुम्ही दिला. माझ्याकडे फळे होती ती मी दिली, 

उलट यामध्ये पण तुमचेच आभार मानेल की तुम्ही दिलेल्या कचऱ्यामुळे माझ्या झाडाला लवकर फळे आली. थँक्स”

असं बोलून शांतपणे तो तरुण निघून येतो. 

*

डीडी क्लास : मित्रमैत्रिणींनो, एक नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला सुखी व्हायच असेल तर एकच गोष्ट विसरू नका. कर्मा रिटर्न्स हे तर असतंच. तुम्ही चांगले केले तर त्याचे फळ चांगले मिळणार, मात्र त्याचवेळी समोरच्याने वाईट कृत्य केले तरी त्याला माफ करून त्याच कृत्यातून पॉजिटीव्ह असे काहीतरी काय करता येईल हे पहा. (जसे त्या तरुणाने कचऱ्याचे खत केले) मग तुमच्या मनाला शांतता लाभेल. चिडचिड होणार नाही. 

“अमुकने माझ्या आयुष्याचे वाट्टोळे केले”

असं काहीजण म्हणतात. पण त्यात तथ्य नसते. कुणीच कुणाचे असे वाट्टोळे करत नसतो तर तुम्हीच काहीतरी वाईट कर्म केलेले असते तर तेच रिटर्न तुमच्याकडे आलेले असते. हे कळले तर जीवन सुखकर होईल. 

कर्म हे असे एक हॉटेल आहे, जिथे ऑर्डर द्यावी लागत नाही.

तिथे तुम्हाला तेच मिळते जे तुम्ही शिजवलेले असते.

कुठेतरी मस्त ऐकण्यात आलेलं ते शेवटी सांगतो अन थांबतो. 

“दाग तेरे दामन के धुले न धुले 

नेकी तेरी कही तुले न तुले 

मांग ले गलतियो की माफी 

कभी तो खुद से ही  

क्या पता ये आँखे 

कल खुले न खुले !

 

लेखक : श्री धनंजय देशपांडे

प्रस्तुती – श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डोळ्यासंबंधी बरंच काही… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ डोळ्यासंबंधी बरंच काही ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे 

(25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर यादरम्यान आपल्या देशामध्ये नेत्रदान पंधरवडा पाळला जातो यानिमित्ताने नेत्रदान व डोळ्याचे आरोग्य याविषयी हा लेख अवश्य वाचा)

नेत्र, ज्याला आपण मराठीमध्ये डोळे म्हणतो हिंदीमध्ये आँख म्हणतो इंग्लिश मध्ये EYE म्हणतो संस्कृतमध्ये नेत्र किंवा चक्षू म्हणतो तेच ते डोळे.

शरीराचा प्रत्येक अवयव महत्वाचा आहे, पण डोळ्यांशिवाय माणूस नुसता अपूर्णच नाही तर शून्यवत होऊन जातो. डोळ्यां विना अस्तित्व या गोष्टीची कल्पना सुद्धा ज्यांना डोळे आहेत त्यांना करता येत नाही.

 

डोळ्याच्या बाहेरील भागात एक पारदर्शक पडदा असतो. त्यातून प्रकाश किरण आपल्या डोळ्यात शिरतात. या पडद्याला नेत्रपटल किंवा पारपटल तर इंग्लिश मध्ये व तांत्रिक भाषेत ‘कॉर्निया’ ( CORNEA ) असं म्हणतात. आपण सोयीसाठी कॉर्निया हाच शब्द वापरू. काही कारणामुळे जेव्हा कॉर्नियाचा पारदर्शकपणा नाहीसा होऊन तो पांढरट होतो, धुरकट होतो त्यावेळी डोळ्यातून प्रकाश किरण आत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे माणूस दृष्टिहीन बनतो. आंधळा म्हणण्यापेक्षा दृष्टिहीन म्हणणं हे जास्त योग्य. कारण कॉर्निया बदलल्या नंतर तो परत डोळस होऊ शकतो. पण हा कॉर्निया बदलायचा कसा ?

इसवी सन १९०५ पर्यंत याबाबतीत कुणी कल्पनाही करू शकलं नव्हतं.

सन १९०५ मध्ये झेक रिपब्लिक या देशात एडवर्ड जर्म व रॅमन कॅस्ट्रोविजो या दोघांनी जगातली पहिली नेत्र प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी रीतीने पार पाडली. त्यानंतर अंधांना दृष्टी देण्यासाठी एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला. परंतु दुर्दैवाने याबाबतची जनजागृती आज शंभर पेक्षाही जास्त वर्षे झाली तरी अपेक्षित प्रकारे झाली नाही. जनप्रबोधन ही प्रक्रिया अत्यंत धीम्या गतीने जाणारी आहे. परंतु गेल्या पंधरा वीस वर्षांमध्ये याला चांगली गती प्राप्त झाली आहे. सध्या अनेक मध्यम शहरांमध्ये सुद्धा नेत्रपेढ्या आहेत. त्यामुळे इच्छुकांचे नेत्रदान करणे सध्या सहज शक्य आहे. बहुतेक कोणत्याही गावापासून काही तासांच्या अंतरावर नेत्रपेढीची उपलब्धता असल्यामुळे तीन चार तासांमध्ये किंवा त्यापेक्षा कमी वेळात नेत्रपेढी ची टीम मृतदेहापर्यंत पोहोचू शकते आणि यशस्वीपणे कॉर्निया काढून घेता येतात. मृत्यूनंतर साधारणपणे सहा तासांच्या आत कॉर्निया काढून घेणे आवश्यक असते. म्हणजे ते चांगल्या स्थितीमध्ये राहू शकतात व त्याचे प्रत्यारोपण यशस्वीपणे करणे शक्य होते.

ज्यांना आपल्या घरी मृत झालेल्या नातेवाईकाच्या नेत्रांचे दान करायचे असेल त्यांनी काही गोष्टी करणे गरजेचे आहे. सर्वप्रथम ज्याचा मृत्यू झाला आहे आणि नेत्र काढून घ्यायचे आहेत अशा व्यक्तीचे स्थानिक डॉक्टर ने दिलेले मृत्यूचे वैद्यकीय प्रमाणपत्र त्वरित मिळवणे आवश्यक आहे, ज्यामध्ये मृत्यूचे कारण व वेळ नमूद केलेली असली पाहिजे. त्यानंतर त्वरित जवळच्या नेत्रपेढी ला फोन करावा, म्हणजे नेत्रपेढी ची टीम योग्य त्या वेळेत मृतदेहा पर्यंत पोहोचू शकेल. देह जमिनीवर झोपलेल्या स्थितीत असावा, पापण्या उघड्या असतील तर त्या बंद कराव्यात. डोक्याखाली उशी द्यावी ज्यायोगे डोके शरीरापासून साधारण सहा इंच वरच्या स्तरावर राहील. त्यानंतर डोळ्यावर ओल्या पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. पंखा चालू असेल तर तो बंद करावा. वातानुकूलन (A. C. ) चालू असेल तर मात्र ते चालूच ठेवावे. नेत्रपेढी ची टीम येईपर्यंत वरचेवर पाण्याच्या पट्ट्या बदलाव्यात. कॉर्निया सुकणार नाहीत याची काळजी घ्यावी.

नेत्र प्रत्यारोपण करीत असताना जमलेल्या व्यक्तींना बाहेर जाण्यास सांगावे. ज्यांना ते पाहता येणे असह्य होणार नाही अशा एखाद दुसऱ्या व्यक्तीला तेथे राहण्यास हरकत नाही. ही प्रक्रिया साधारणपणे अर्ध्या तासात पार पडते. ही टीम आल्यानंतर त्यांच्यासाठी कोमट पाणी आणि हात धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था आणि एकदे डस्टबिन जवळ असू द्यावे.

फक्त बुडून मृत्यू झाला असेल तर त्या मृतदेहाचे डोळे उपयोगी पडत नाहीत.

कॉर्नियामध्ये रक्तवाहिन्या नसतात त्यामुळे रक्तगट जुळण्याचा प्रश्न नसतो.. कोणाचाही कॉर्निया कोणालाही बसवता येतो. परंतु काही विशिष्ट संसर्गजन्य रोगग्रस्तांचे कॉर्निया बसवता येत नाही. उदाहरणार्थ कावीळ, एड्स, कॅन्सर आणि शरीरभर पसरलेले सेप्टिक अशा अनेक संसर्गजन्य रोगांमुळे मृत्यू झालेली व्यक्ती बाधित असेल तर अशा व्यक्तीच्या डोळ्यापासून ज्याला डोळे बसविले जातील त्याला त्या संसर्गाचा धोका असतो. म्हणून अशा रोगांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तीचे नेत्रदान होऊ शकत नाही. नेत्र काढून घेतल्यानंतर मृतदेहातून थोडासा रक्ताचा नमुना काढून घेण्याची पद्धत असते, ज्यायोगे मृत शरीरामध्ये यापैकी कोणती लक्षणे नाहीत ना याची चाचणी करता येते. कोणत्याही वयाची व्यक्ती नेत्रदान करू शकते. परंतु कधीकधी अति वयस्कर व्यक्तींचे नेत्र रोपणाच्या उपयोगाचे नसू शकतात. अशा वेळेला अशा नेत्रांचा उपयोग मात्र संशोधनासाठी होऊ शकतो. त्यामुळे प्रत्यारोपणासाठी योग्य नसतील तर नेत्रदान करू नये अशा पद्धतीचा विचार मृत व्यक्तीचे नातेवाईक करतात. हे ही योग्य नाही. कारण संशोधन ही सुद्धा गरजेची गोष्ट आहे. संशोधनामुळे काय फायदा होतो याचं एक उदाहरण देता येईल. नेत्रा वरील संशोधनामध्ये अलीकडे असे आढळून आले आहे की कॉर्निया मध्ये दोन थर असतात. त्यामुळे एका कॉर्नियाचे दोन कॉर्नियामध्ये रूपांतर करता येते. त्यामुळे एका मृत व्यक्तीच्या नेत्रदानामुळे पूर्वी दोन व्यक्तींना दृष्टी मिळू शकत होती पण आता चार व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. याचा अर्थ नेत्रदानाची गरज निम्म्यावर आली आहे. त्यापुढेही या विषयावर संशोधन झाले आहे आणि आता अजून क्रांतिकारी संशोधन येण्याची शक्यता आहे. हा संशोधनाचा किती मोठा फायदा आहे ? त्यामुळे जरी प्रत्यारोपणासाठी नेत्र उपयुक्त नसतील तरी नातेवाइकांनी संशोधनासाठी असे नेत्र वापरण्याचा आग्रह धरून नेत्रदान नक्की करावे. डोळ्याची संरचना ही सगळ्यात गुंतागुंतीची आहे. मेंदूच्या रचने नंतर दुसरा नंबर डोळ्याच्या रचनेचा लागतो. डोळ्यावर खूप मोठे संशोधन करणे आवश्यक आहे. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी परवानगी दिल्यास संपूर्ण डोळा म्हणजेच आयबॉल सुद्धा काढून घेऊन जाता येतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी संपूर्ण डोळा काढून घेण्याची परवानगी दिल्यास संशोधनासाठी आणि नेत्र प्रत्यारोपण प्रशिक्षणासाठी सुद्धा संपूर्ण डोळा म्हणजेच आयबॉल याची आवश्यकता असते. अजूनही रेटिना च्या अंधत्वावर उपाय सापडलेला नाही. ज्यावेळेस संपूर्ण डोळा म्हणजेच आयबॉल काढून घेतला जातो त्यावेळेस त्या खोबणी मध्ये दुसरा कृत्रिम आयबॉल बसवला जातो, आणी पापण्या बंद केल्या जातात. त्यामुळे चेहऱ्यावर कोणतीही भेसूरता किंवा विद्रूपपणा येत नाही. म्हणूनच संशोधनाच्या उपयुक्तते साठी संपूर्ण डोळा सुद्धा द्यावा अशी शिफारस करण्यास हरकत नाही. जगातील एकूण अंध व्यक्तींपैकी 25% अंध व्यक्ती भारतामध्ये आहेत. २०१८ च्या आकडेवारीनुसार भारतामध्ये एकूण ५२ लाख अंध व्यक्ती होत्या. (आणि दरवर्षी त्यात सूमारे ३५ हजार नवीन अंधांची भर पडतेच आहे. ) त्यातील ४६ लाख अंध व्यक्ती कॉर्निया मुळे अंध झालेल्या आढळल्या. त्यांचे अंधत्व नेत्रदानाने नक्कीच दूर होऊ शकते. परंतु दुर्दैवाने आपल्या देशात वर्षभरात साधारणपणे १० ते १५ हजार व्यक्तींचेच नेत्रदान होते.

नेत्र रोपण शस्त्रक्रिया ही अनेक वर्षांच्या यशस्वीतेने आणि अनुभवाने सिद्ध झालेली शस्त्रक्रिया आहे. या शस्त्रक्रियांचा यशस्वीतेचा दर हा 90 टक्के आहे. त्यामुळे बहुतेक सर्व नेत्रदाने, यशस्वीरित्या इतरांना दृष्टी देण्यासाठी रोपण करता येतात.

नेत्रदानाचा संकल्प करणे म्हणजे नेत्रदानाच्या संकल्पपत्रावर सही करणे एवढाच अर्थ घेतला जातो. परंतु ही प्रक्रिया अपुरी आहे. नेत्रदान यशस्वी व्हायचे असेल तर संकल्प पत्रावर सही केल्यानंतर किंवा संकल्प पत्र न भरता सुद्धा आपण आपल्या मनात निश्चय केल्यानंतर आपल्या जवळच्या नातेवाईकांना, आपल्या वारसदारांना या गोष्टीबाबत पूर्णपणाने सजग करणे आवश्यक आहे. त्यांना नेत्रदानाची संपूर्ण माहिती देणे ही गरजेची गोष्ट आहे. त्यांचे संपूर्ण समाधान झाल्यानंतर, आपल्या मृत्यूनंतर नेत्रदान झाले पाहिजे याची जबाबदारी तुमची आहे आहे याची त्यांना जाणीव करून दिल्यानंतरच, नेत्रदान यशस्वी होण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. त्यामुळे संकल्पपत्र भरण्या बरोबरच आपल्या कुटुंबातल्या सर्व व्यक्तींना याबद्दल माहिती देणे आणि त्यांना त्यासाठी तयार करणे हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.

आपल्या देशात नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्या एकूण व्यक्तींपैकी फक्त एक टक्के व्यक्तींचेच प्रत्यक्ष नेत्रदान होते. याचाच अर्थ संकल्पपत्र भरणे या कृती पेक्षा प्रत्यक्ष नेत्रदान घडवून आणण्यासाठी कुटुंबातल्या लोकांना जागृत करणे हीच सगळ्यात महत्वाची व आवश्यक गोष्ट आहे.

कोणत्याही वयाची व्यक्ती नेत्रदान करु शकते. कुठल्याही प्रकारचा डोळ्याचा नंबर असेल किंवा मोतीबिंदू वा काचबिंदू शस्त्रक्रिया झाली असेल किंवा मधुमेह आणि रक्तदाब असेल अशी कोणतीही व्यक्ती मृत्यूनंतर नेत्रदान नक्कीच करू शकते. अपघातात व्यक्ती मृत झाली असेल तर स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांच्या परवानगीने कायदेशीरपणे नेत्रदान होऊ शकते, ते पोस्टमॉर्टेम करण्यापूर्वी करता येते. ज्यांचे कॉर्निया चांगले आहेत परंतु इतर काही दोषांमुळे ज्यांना अंधत्व आले आहे अशा अंध व्यक्ती सुद्धा नेत्रदान करु शकतात. जवळच्या नेत्रपेढीचे क्रमांक आपल्या घरात कॅलेंडरवर किंवा कुठेतरी लिहून ठेवणे आवश्यक आहे. या बाबतीत आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीच्या व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर तसेच बॅंका, पोस्ट ऑफिस वगैरे ठिकाणी खाजगी हॉस्पिटलच्या बाहेरच्या बाजूस जवळच्या नेत्र बँकेचे फोन नंबर एका बोर्डवर लिहून ठेवणे आवश्यक आहे. तसे झाल्यास नेत्रपेढीचा क्रमांक शोधण्यासाठी कोणाला ऐनवेळी धावपळ करायला लागणार नाही.

तसेच राष्ट्रीय क्रमांक १९१९ हा टोल फ्री क्रमांक असून या क्रमांकावर फोन केल्यास आणि आपले ठिकाण सांगितल्यास त्यांचेकडून आपल्या जवळच्या नेत्र बँकेचा क्रमांक आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे ऐन वेळेस नेत्र बँकेचा नंबर शोधण्याची धावपळ करावी लागणार नाही. नेत्रदान केल्यानंतर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना ते डोळे कुणाला बसले आहेत हे कधीही सांगितले जात नाही परंतु त्या डोळ्यांचा उपयोग रोपणासाठी झाला आहे किंवा नाही एवढीच माहिती मिळू शकते.

प्रत्येक व्यक्तीने जिवंतपणी आपल्या डोळ्याची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे, ज्यायोगे मृत्यूनंतर आपले डोळे एखाद्या नेत्रहीनाला उपयोगी पडतील.

डोळ्याचे महत्त्वाचे भाग म्हणजे बाहेरील भागात पारपटल म्हणजेच कॉर्निया (पारपटल) त्यानंतर नेत्रमणी म्हणजेच लेन्स, त्यानंतर महत्त्वाचा भाग हा नेत्रपटल म्हणजेच रेटिना. नेत्रमणी व नेत्रपटल याच्यामध्ये एक द्रवपदार्थ असतो. या द्रवपदार्थाचा दाब योग्य तऱ्हेने नियंत्रित केला गेलेला असतो. परंतु काही कारणामुळे तो दाब जर वाढला तर डोळ्याचे विकार होतात. त्यामुळे मुख्यत्वे काचबिंदू हा विकार उद्भवू शकतो. आजकाल मधुमेहाच्या रुग्णांमध्ये काचबिंदूचे प्रमाण जास्त आढळते. त्यासाठी तरुणांनी वर्षदोनवर्षातून एकदा आणि पन्नाशीनंतर दर सहा महिन्यातून एकदा डोळ्यांची संपूर्ण तपासणी करून घेणे आवश्यक आहे. म्हणजेच योग्य वेळेस जर एखाद्या व्याधीचे निदान झाले तर त्यावर उपचार करून त्या व्याधींपासून मुक्तता मिळू शकते. प्रत्येक जिवंत व्यक्तीने स्वतःच्या डोळ्यांची योग्य ती काळजी अवश्य घेतली पाहिजे.

नेत्रदानच नव्हे तर एकूणच अवयवदाना याविषयी विविध धर्मांचा विरोध नसल्याबद्दलचा उहापोह अवयवदान आणि धर्म याविषयीच्या लेखामध्ये मी केला आहे. त्यामुळे कोणत्याही धर्माचा विरोध नेत्रदानाला नाहीच हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे नेत्रदान हे एक पवित्र आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे या भावनेने प्रत्येकाने नेत्रदानाचा संकल्प केला पाहिजे. नेत्रदान हे एक मानवतेचे कार्य आणि राष्ट्रकर्तव्य आहे.

© श्री सुनील देशपांडे

पाषाण, पुणे  मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लेखन ‘कला’… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ लेखन ‘कला’… ☆ श्री सुनील शिरवाडकर

ना. सी. फडके

अप्पांनी रात्रीच मनाशी जुळवाजुळव करून कादंबरीचा आराखडा डोक्यात तयार करून ठेवला होता. पांढऱ्याशुभ्र कोऱ्या.. गुळगुळीत कागदांचा गठ्ठा.. पेन जागेवर आहे ना हे पाहीलं. त्यांनी विजयला सांगितले.. आज लेखनाला बसायचे आहे. आपल्या ‘दौलत’ बंगल्याच्या पश्चिमेकडे तोंडात करून असलेल्या खिडकीजवळचे टेबल म्हणजे त्यांची लिहीण्याची जागा.

स्नान वगैरे करुन.. शुचिर्भूत होऊन अप्पा आपल्या रिव्हॉलवींग चेअरवर बसले. बाजुला लेखनिक म्हणून त्यांचा मुलगा विजय.

हे अप्पा.. म्हणजेच जुन्या पिढीतील लोकप्रिय लेखक ना. सी. फडके. ते ज्या खुर्चीत बसले होते ती त्यांना भेट म्हणुन मिळाली होती. त्यांच्या पन्नासाव्या कादंबरीच्या.. ‘कुहु!कुहु!’ च्या प्रकाशन सोहोळ्यात.

तर अप्पांनी मजकूर सांगायला सुरुवात केली. अत्यंत वेगात. तो लिहुन घेतांना विजयची धांदल होई. ऱ्हस्व.. दीर्घ सांभाळायचे आणि अक्षरही सुंदर काढायचे यावर अप्पांचा कटाक्ष. चतकोर आकाराची १५-१६ पानं लिहुन झाली की अप्पा थांबत.

‘छान लिहिलं आहेस’ या अप्पांच्या शाबासकीसाठी विजय थांबुन राही. त्यांनी तसं म्हटल्यावर त्याचं हात दुखणं वगैरे पळुन जाई.

आप्पांच्या तोंडातून निघालेला शब्द अंतिम असे. सगळा पुर्ण विचार करुनच ते कथन करायला बसत. रात्री जेवण झाल्यावर पुन्हा एकदा ते आपल्या टेबलपाशी येत. लिखाणातल्या शुद्धलेखनाच्या चुका शोधून काढत. बाजूला असलेल्या समासात दुरुस्त्या लिहून ठेवत.

अशी फायनल झालेली कॉपी बघत रहावी अशी असायची. शिस्तबध्द.. नेटकेपणा.. आणखी देखणेपण लगेच नजरेत भरे.

अप्पांचे चिरंजीव विजय फडके सांगतात..

“आप्पा त्यांच्या खोलीत नसताना त्यांची फाईल उघडून ती बघावीशी वाटे. कागदावरच्या मार्जिनमध्ये आप्पांनी त्यांच्या झोकदार अक्षरात लिहीलेल्या शुध्दलेखनाच्या चुका बघाव्याशा वाटत. शाळेतल्या शिक्षकांनी शिकवलेलं शुध्दलेखन माझ्या लक्षात नाही.. पण अप्पांच्या हाताखाली काम करता करता आपोआप लेखन शुद्ध होत गेलं. “

शेकड्यांनी कादंबऱ्या लिहिणारे सिध्दहस्त लेखक ना. सी. फडके. आणि त्यांचे लेखनीक म्हणुन काम करणारे त्यांचे चिरंजीव विजय फडके. दोघेहि ग्रेटच. आजच्या कॉम्प्युटर टायपिंगच्या जमान्यात तर ते अधिक मोठे वाटतात.

या महान लेखकाला ही एक आदरांजली !!

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १३ — क्षेत्रक्षेत्रज्ञ योग — (श्लोक १ ते १0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १३ — क्षेत्रक्षेत्रज्ञ योग — (श्लोक १ ते १0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

श्रीभगवानुवाच

इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते ।

एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः ॥ १ ॥

कथित श्रीभगवान 

देहासी या कौन्तेया क्षेत्र नाम जाण

क्षेत्राचे ज्या ज्ञान त्यासी म्हणती क्षेत्रज्ञ ॥१॥

*

क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत ।

क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम ॥ २ ॥

*

समस्त क्षेत्रांमध्ये भारता मीच जाण क्षेत्रज्ञ

ऋतज्ञान जे जाण देते क्षेत्र तथा क्षेत्रज्ञ ॥२॥ 

*

तत्क्षेत्रं यच्च यादृक् च यद्विकारि यतश्र्च यत् ।

स च यो यत्प्रभावश्र्च तत्समासेन मे शृणु ॥ ३ ॥

*

ऐक अर्जुना तुला सांगतो क्षेत्र प्रकार विकार कार्य

क्षेत्रज्ञ कोण प्रभाव त्याचा काय तयाचे कार्य ॥३॥

*

ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक् ।

ब्रह्मसूत्रपदैश्र्चैव हेतुमद्भिर्विनिश्र्चितैः ॥ ४ ॥

*

बहुत ऋषींनी बहुछंदांतुन पदांतुनी गाईले

कार्यकारणरूप तयांचे ब्रह्मसूत्रे दाविले ॥४॥

*

महाभूतान्यहङ्कारो बुद्धिरव्यक्तमेव च ।

इन्द्रियाणि दशैकं च पञ्च चेन्द्रियगोचराः ॥ ५ ॥

*

इच्छा द्वेषः सुखंदुःखं संघातश्र्चेतना धृतिः ।

एतत्क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम् ॥ ६ ॥

*

महाभूते अहंकार मति यांनी झाले साकार

दशैकिंद्रिये पञ्चेंद्रियासी पञ्चविषय गोचर

द्वेष कामना सुखदुःख चेतना इंद्रिय संतुलन धैर्य 

उपांग तयांचे विकार समस्त एकत्रित ते क्षेत्र ॥५, ६॥

*

अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम् ।

आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः ॥ ७ ॥

*

इंद्रियार्थेषु वैराग्यमनहङ्कार एव च ।

जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम् ॥ ८ ॥

*

असक्तिरनभिष्वङ्गः पुत्रदारगृहादिषु ।

नित्यं च समचित्तत्वमिष्टानिष्टोपपत्तिषु ॥ ९ ॥

*

मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी ।

विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि ॥ १० ॥

*

अभिमान विरहित स्पर्श ना दंभाचा

क्षमाशीलता अहिंसा सरळ स्वभावाचा

गुरुसेवा अनुष्ठान निग्रह मनाचा

स्थैर्य शुचिर्भूतता विरक्त इंद्रियांचा

अहंकारहीन लीन अनासक्त मनाचा

विरक्त जीवन न गुंता संसारमोहाचा

दोष जननमरणाचा व्याधीचा वार्धक्याचा

इष्टानिष्ट प्राप्ती समता चित्ताची 

अढळ भक्ती अनन्यभावाची

जीवनी आचरण एकान्तवासाचे ॥७-१०॥ 

 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पद्मविभूषण शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? इंद्रधनुष्य ?

☆ “पद्मविभूषण शिवशाहीर श्री बाबासाहेब पुरंदरे☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

जय भवानी •••जय शिवाजी••• म्हणताना उर जसा अभिमानाने भरून येतो ना, शिवाजीचे कर्तृत्व आठवून रक्तामध्ये एक अनोखी शक्ती निर्माण होऊन, एक जोष निर्माण होतो ना••••

तसाच •••किंबहुना त्याहुनही जास्त जोष, किमान सर्व पुरंदरे यांच्या अंगी येतो•••• तो म्हणजे शिवचरित्र, शिवाजी महाराज, घरोघरी पोहोचविणाऱ्या, पद्मविभूषण, शिवशाहीर, श्री बाबासाहेब पुरंदरे हे नाव उच्चारले की••• हे आदरणीय व्यक्तिमत्त्व समोर दिसले की, आत्ताच 98 व्या वर्षी काढलेले उद्गार आठवतात ••• त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य सांगताना ते म्हणतात, मी माझ्या मनात एक आठ – नऊ वर्षाचे मूल जपलेआहे. त्यामुळे त्यांचे भाव हे मला चिरतरुण, दीर्घायू करायला मदत करत आहेत.

असेच छान छान उद्गार, छान छान विचार, आमच्या कानावर सतत पडत असल्याने, एक अभिमान वाटावा, असा आदर्श समोर आला••• अगदी ठरवलेले नसले तरी, त्यांची कृती, विचार, वागणे, बोलणे, रहाणे, हे सगळे नकळत मनावर बिंबवले गेले••• नव्हे मनात रुजले गेले आहे••• आणि हेच बीज अंकुरून आता कुठे तरी त्यांची पाऊलधूळ मला स्पर्श करण्याचे सामर्थ्य आले आहे असे वाटते.

विचारणारे विचारतात श्री बाबासाहेबांकडून तुला हा वारसा मिळाला आहे का? तर नक्कीच, अगदी अभिमानाने, ‘हो’ असे उत्तर येईल••• पण मुळात, पुरंदरे हा इतिहासच एवढा रोमांचक आहे की, त्यातून पुरंदरे नसणाऱ्यांना सुद्धा स्फूर्ती येईल•••

मी आता इतिहास म्हटले तो म्हणजे किती तरी पिढ्यानुपिढ्या आलेले रक्तातून रक्तात आलेले संस्कार हा पुरंदर इतिहास सुद्धा मला वाटतं बाबासाहेब यांच्यात संशोधनातून पुढे आला आहे पुरंदरे दप्तर यामध्ये असलेली रंजक माहिती ती पुन्हा नवीन पुरंदरे दप्तर यामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेली आहे पण म्हणतात ना गेल्या दहा पिढ्या बद्दल जास्त नाही सांगता आले तरी आज श्री बाबासाहेब पासून आमची मुले किंवा त्यांची नातवंडे अशा पिढ्यांमध्ये श्री बाबासाहेबांचा आदर्श घेतला जातो आहे त्यांच्याकडे बघून आम्ही बाबासाहेबांचे पुरंदरे या नात्याने वंशज आहोत आणि त्यांच्या कर्तुत्वाचा बोलण्याचा आणि खाण्याचा प्रचंड प्रभाव पडल्यामुळे आज मी जे काही थोडेफार लिखाण करू शकते ते शक्य झाले.

माझे वडील, सासवडचे श्री नानासाहेब पुरंदरे, एक अनोखे साहित्यप्रेमी, साहित्य रसिक होते••• त्यांनी फार जास्त लिखाण केले नसले तरी, श्री बाबासाहेबांसह अनेक साहित्यिक आमच्या घरी यायचे, राहायचे, साहित्यिक चर्चा व्हायच्या••• हे सगळे संस्कार, मनावर होत गेले••• आणि ज्या मातीत आपण रुजले गेलेलो असतो त्या मातीचे संस्कार, शिकवावे लागत नाहीत•••तर ते आपोआप होतात••• त्याप्रमाणे पुरंदर्‍यांचे संस्कार हे आपोआप झाले.

श्री बाबासाहेबांची चालणारी शिवचरित्र व्याख्यानमाला, ही आठवडाभराची पर्वणी असायची•• ती व्याख्याने प्रत्यक्ष ऐकली जायची, पण त्या काळात घरी असलेला मुक्काम •••त्यात नामवंत लोकांबरोबर झालेल्या चर्चा •••यातून त्यांचे बारकाईने निरीक्षण होत होते •••त्याची छाप कुठेतरी मनावर खोल पडली गेली. •••

त्यामुळे स्वाभिमानी, पण नम्रपणा हा आपोआप गुण आला असावा••• लहानपणी त्यांच्या भाषणातूनच या बाबासाहेबांची ओळख झाली •••हे आपले काका आहेत हे सांगताना होणारा आनंद अवर्णनीय असायचा••• पण त्यांचे लहानपण मात्र आम्ही मोठे झाल्यावरच कळले.

सासवडच्या राहणाऱ्या मोरेश्वर पुरंदरे यांच्या कुटुंबात 29 जुलै 1922 रोजी या सुपुत्राचा जन्म झाला •••आणि हौसेने या बालकाचे नाव, ‘बळवंत’ ठेवले गेले••• तेच हे ब. मो. तथा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे•••

यांना लहानपणापासून त्यांच्या वडिलांमुळे गड किल्ल्याची आवड निर्माण झाली. वडील छान गोष्टी सांगायचे, तशी गोष्टी सांगायची आवड निर्माण झाली; आणि वयाच्या आठव्या वर्षी एक कीर्तनकार न आल्यामुळे, नरसिंह अवताराची गोष्ट त्यांना सांगायला लागली.

निर्भीडपणे सर्व लोकांमध्ये त्यांनी सांगितलेली ही कथा सगळ्या गावकऱ्यांना आवडल्यामुळे हेच त्यांच्या वक्तृत्वाचे मोठे कारण झाले.

याच गोष्टीचे साधर्म्य, शिवबांनी अफजल खानाचे पोट फाडले••• या कथेशी वाटून, त्यांना शिवचरित्राचा ध्यास लागला; आणि याच नादातून, ध्येयातून, त्यांनी शिवचरित्राची निर्मिती केली.

शिवचरित्र लिहून झाल्यावर, ते छापायला पैसे नसल्याने, भाजीपाला विकूनही त्यांनी ही रक्कम जमवली.

याच कथेतून, ध्येयासक्ती कशी असावी •••, पैसे नसले तरी कष्ट करण्याची तयारी असणे•••, आणि त्यासाठी पडतील ते कष्ट घेतले पाहिजेत •••आणि सगळ्यात महत्वाचे मनात जिद्द असावी••• असे अनेक गुण त्याचे महत्त्व हे न सांगता मनावर बिंबले गेले •••आणि यातूनच आपणही काही लिहावे •••कष्टाला डगमगू नये••• जिद्द धरावी हे गुण आले आहेत असे वाटते•••

श्री बाबासाहेबांच्या लिखाणाचा प्रभाव इतका पडला की, अलीकडे मी शिवाजीच्या दहा-बारा कथा पावसाच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला आहे •••त्यातील काही कथा मी माझ्या फेसबुक वरूनही प्रसारित केल्या आहेत.

बाबासाहेब हे कधीच प्रसिद्धी, कीर्ती, यांच्या मागे धावले नाहीत••• तर, शिवाजीच्या प्रेमापोटी, इतिहासाच्या ध्येया पोटी, आणि काहीतरी करून दाखवायची जिद्दीपोटी, ते आपले काम निस्वार्थीपणे करत राहिले••• आहेत •••आणि राहतीलही•••यात शंकाच नाही! त्यामुळेच, यातून झालेल्या परिणामामुळे, हा परिणाम फक्त बाबासाहेबां पुरता मर्यादित न राहता, महाराष्ट्रात, भारतात, नव्हे तर••• विदेशातही जाणवू लागला••• आणि मग, त्यांची कृती इतकी सुंदर, ते खरोखर महान आहेत •••हे आपल्या कार्याने दाखवून दिल्यावर, वयाच्या 95 व्या वर्षी, त्यांना ‘पद्मविभूषण’ हा पुरस्कार मिळाला.

यापूर्वी त्यांना असंख्य पुरस्काराने गौरवण्यात आले आहे पण आवर्जून सांगावेसे वाटणारी पुरस्कार म्हणजे, महाराष्ट्रभूषण, पुण्यभूषण, पद्मविभूषण, आणि पुरंदर्‍यांचे भूषण ठरलेले हे पुरंदरे भूषण!!!!!

त्यांचे मोठेपण सांगायचे झाले तर, त्यांचा धाडसी बाणा, लेखन शैली, स्मरणशक्ती, वक्तृत्व, आत्मविश्वास, आणि जिद्द••• हे वैशिष्ट्य, त्यांचे अनुकरण जे करु इच्छीतात, नियमितपणे त्यांचे लेखन वाचतात, ऐकतात, त्यांना आपोआप आशीर्वादाने मिळतोच; नव्हे हे सगळ्यांनी घ्यावे अशी त्यांची इच्छा आहे.

अशा शिवशाहीर बाबासाहेबांची, वारसदार म्हणून मला त्याचा सार्थ अभिमान आहे •••त्यांच्याबद्दल एवढेच म्हणेन•••

श्री मंत सरदार,

बा वन कशी शिवाजी अभ्यासक,

बा णा शिवाजी धारक,

सा धी रहाणी उच्च विचारसरणी अंगीकारक,

हे रंब, भवानी उपासक,

हुमान अनेक संपादक,

पु ण्यनगरी चे रहिवासक,

रं ध्रोरंध्री शिवाजी ठासक,

र महाराष्ट्रीयास प्रेरक,

रे शमी बोलीतून मनोवेधक,

पुरंदरे भूषण, महाराष्ट्रभूषण, पुण्यभूषण, पद्मविभूषण, शिवशाहीर, श्री बाबासाहेब पुरंदरे, आपणास आरोग्यमयी, उमेद देणारे, शांतीचे, समाधानाचे, राजा शिवछत्रपती गुणगौरव करणारे, प्रदीर्घ आयुष्य लाभलेले ••• आपली आशिष छत्रछाया, अशीच सगळ्यावर राहो••• हीच प्रार्थना •••

आणि बाबासाहेबांनी दिला, आत्मविश्वास, जिद्द, अभिमानाचा वसा,

आम्ही चालवू हा पुढे वारसा••• हे मुख वचन•••

 

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सैनिकांसाठी श्वास… ध्यास आमुचा ! – भाग-२ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ सैनिकांसाठी श्वास… ध्यास आमुचा ! – भाग-२  ☆ श्री संभाजी बबन गायके 

सैनिकांसाठी श्वास… ध्यास आमुचा !

… अर्थात गिरीशिखरांच्या भाळी श्वासगंध रेखताना…! 

श्री. योगेश चिथडे आणि सौ. सुमेधा चिथडे यांनी सियाचीन मधील सैनिकांसाठी ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारून देण्यासाठी केलेल्या भगीरथ प्रयत्नांची कहाणी!

(पण सत्य संकल्पाचा दाता नारायण या उक्तीनुसार जनता-जनार्दनाने मदतीचे अनेक हात पुढे केले. आणि अथक प्रयत्नांतून आवश्यक रक्कम उभी राहिली. ) – इथून पुढे)

या कामासोबतच प्रशासन, सेनादल यांचेशी समन्वय साधणे, विविध परवानग्या मिळवणे इत्यादी कामे अतिशय चिकाटीने आणि ध्यासाने पूर्ण केली! हत्ती जाईल पण शेपूट जाणार नाही अशी लूप-होल्स सर्वच ठिकाणी अनुभवाला येतातच. यावर जिद्द आणि आपल्या कामावरील विश्वास हाच उपाय! 

ऑक्सिजन निर्मिती संयंत्र जर्मनीहून आणले. त्यासाठी सर्व सोपस्कार, औपचारीकता पूर्ण केल्या. यंत्रसामग्री सियाचीन परिसरात पोहोचवणे मोठे कठीण! विमानात चढवलेले साहित्य कैक वेळा खराब हवामानामुळे पुन्हा उतरवून खाली ठेवावे लागत होते. यात चिथडे साहेबांनी सियाचीन परिसरात अनेक वेळा प्रवास आणि मुक्काम केला. तेथील हवामानाचा प्रतिकुल परिणाम चिथडे साहेबांच्या प्रकृतीवर झालाच. पण चिथडे दांमप्त्य आपल्या वीर जवानांसारखे परिस्थितीला तोंड देत राहिले. मध्येच कोरानाचे संकट उभे ठाकले, आर्थिक गणिते जुळेनात, शिवाय देणगीतील रक्कम फक्त आणि फक्त यंत्रणा खरेदीच्याच कामासाठी वापरण्याचे, वेतनावर खर्च होईल म्हणून कोणीही पगारदार साहाय्यक न नेमण्याचे, कार्याची अंमलवजावणी करण्याचा खर्च कटाक्षाने स्वकमाईच्या पैशांनी करण्याचे तत्व अंगिकारलेले असल्याने सियाचीनवरील हवामानासारखीच अनेक आव्हाने चिथडे पती-पत्नी आणि त्यांचे सहकारी यांच्यासमोर होती पण ते डगमगले नाहीत! शिवाय स्वत:वर होणारा खर्च अत्यंत अत्यावश्यक गरजेपुरताच राहील असा यांचा कटाक्ष तर प्रारंभापासूनच आहे.

या त्यागाचे, नियोजनाचे, कार्यक्षमतेचे, चिकाटीचे, ध्यासाचे फळ म्हणूनच सियाचीन मध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट अर्थात प्राणवायू निर्मिती संयंत्र उभारले गेले आणि कार्यांन्वयितही झाले. ही तारीख होती ४ ऑक्टोबर, २०१९! सियाचीन परिसरातील सैनिक, नागरीक, पर्यटक, गिर्यारोहक अशा आजपर्यंत ३५ हजार लोकांसाठी प्राणरक्षक ठरलाय हा ऑक्सिजन प्लांट! हनुमंतरायाने जणू संजीवनी बुटीसाठी सबंध द्रोणागिरी पर्वत उचलून आणण्यासारखा हा प्रकार नव्हे काय? हा प्लांट आतापर्यंत एकदाही बंद पडलेला नाही आणि ऑक्सिजन निर्मिती क्षमता आहे मिनिटाला २२४ लिटर्स! यामुळे कितीतरी जवानांचे, नागरीकांचे प्राण वाचवले जाऊ शकले! कोरोना काळात तर या प्लांटचा सर्वांनाच खूप उपयोग झाला.

दुस-या महायुद्धाच्या काळात, १९४० मध्ये डंकर्क या ठिकाणी इंग्लंड आणि दोस्त राष्ट्रांचे सैन्य शत्रूसैन्याच्या वेढ्यात अडकून पडले असताना इंग्लंडच्या जनतेने सैन्यास उत्स्फूर्त साहाय्य करून सोडवून आणले होते! यापेक्षाही चिथडे दांमप्त्याने लोकसहभाग मिळवून भारतीय सैन्याला दिलेले हे साहाय्य मोठे म्हणावे लागेल! ही तर जनतेचे प्राण वाचवणा-या सैनिकांना जनतेकडून मिळालेली फार मोठी भेट म्हणता येईल. किंबहुना हा जागतिक पातळीवरील अलौकीक विक्रमच असावा! पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी योगेशजी आणि सुमेधाजी चिथडे यांच्या कामाची वैय्यक्तिक पातळीवर दखल घेऊन त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटीत चर्चाही केली आणि कौतुकही केले! सैन्यदल प्रमुख जनरल दिवंगत हुतात्मा बिपिनजी रावतसाहेब, मधुलिका रावत मॅडम यांनी योगेशजी आणि सुमेधाजींच्या कार्याची प्रशंसा केली होती! सेनाध्यक्ष जनरल श्री. मुकुंद नरवणेसाहेब आणि अशा अनेक दिग्गजांनी या कार्याचे कौतुक केले आहे… मुख्य म्हणजे सीमेवर लढणा-या सैनिकांचे, सियाचिन परिसरातील हजारो नागरीकांचे आशीर्वाद या कार्याला लाभले आहेत!

पण एका ऑक्सिजन प्लांटने गरज भागलेली नाही… देशाच्या इतर सीमांवर असे अजून किमान दोन प्लांट उभारण्याची चिथडे दांमप्त्याची योजना आहे कारण तशी गरजही आहे… अर्थातच यासाठी अजून मोठा पैसा लागणार आहे! वैय्यक्तिक समस्या बाजूस सारून योगेशजी आणि सुमेधाजी आता दुसरा ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारून देण्याच्या कामात व्यग्र झालेले आहेत. आता जनतेने मागे राहून चालणार नाही. सुमारे १४० कोटी नागरीकांच्या या महाकाय देशात जनतेला काय अशक्य आहे? फक्त सहृदय लोकांनी पुढे आले पाहिजे. चिथडे साहेब, सुमेधाताई यांच्या मनात आणखी बरेच उपक्रम आहेत. कर्तव्यावर असताना जखमी झाल्याने अपंग झालेले, निवृत्त झालेले सैनिक यांच्यासाठी निवासी संकुल, वीरपत्नींसाठी रोजगाराभिमुख उपक्रम, त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक साहाय्य इत्यादी खूप योजना आहेत. कामात आर्थिक, प्रशासकीय पारदर्शकता हे चिथडे दांमप्त्याने स्थापन केलेल्या ‘सिर्फ’ संस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे! देणगीतील प्रत्येक पै ज्यासाठी देणगी दिली गेली आहे, त्याच कामासाठी खर्च केली जाते! 

पडद्यामागील हुतात्मे!

देशाचे रक्षण म्हणजे सैनिक, देशरक्षणासाठी युद्धभूमीवर मृत्यू पावणे म्हणजे हौतात्म्य असी सामान्यजनांची समजूत असते. परंतू काही देशप्रेमी नागरीकही आपल्या नागरी जीवनात राहून सैनिकाची भूमिका बजावत असतात आणि प्रसंगी आपल्या कर्तव्यासाठी आपल्या जीवाचीही पर्वा करीत नाहीत! 

पुण्यातील योगेश चिथडे हे असेच एक नागरीक-माजी सैनिक. योगेशजींनी काही वर्षे भारतीय हवाई दलात सेवा बजावली. त्यांना सैनिक जीवनातील समस्या, आव्हाने जवळून पाहता आली. सियाचिनसारख्या जगातील सर्वाधिक उंचावर असलेल्या युद्धभूमीवर लढताना सैनिकांना अक्षरश: श्वास कमी पडतो. या सैनिकांसाठी कृत्रिक श्वास अर्थात ऑक्सिजन प्लांंट उभारण्याची अलौकिक कल्पना योगेशजींना सुचली. यासाठीचा खर्च संपूर्णपणे जनतेतूनच उभारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्यांच्या पत्नी सुमेधाजींनी आपल्या पतीच्या या भगीरथ प्रयत्नांमध्ये तनमनधनाने साथ दिली. आणि देशात विविध ठिकाणी कोट्यवधी रूपये मूल्य असलेले ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प स्थापित झाले. कोरोनाच्या काळातही काम सुरू होते. निधी संकलनासाठी योगेशजी आणि सुमेधाजी यांनी शेकडो व्याख्याने दिली. आणि विशेष म्हणजे या सर्व कार्यासाठी स्वत:चा पैसा वापरला. जमा झालेल्या पैशांतून एकही पैसा त्यांनी कार्याच्या खर्चसाठी वापरला नाही. योगेशजींनी प्रत्यक्ष सियाचिन परिसरात कित्येक दिवस राहून ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी अभ्यास केला. प्रत्यक्ष प्लांट कार्यान्वित करण्यासाठी विविध संस्थांशी संपर्क साधला. या सर्व खटाटोपात सियाचिनमधील अतिथंड वातावरणाचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झालाच. पण त्याची पर्वा न करता या माजी सैनिकाने आपले कर्तव्य पार पाडले. वयाच्या अवघ्या ६१व्या वर्षी योगेशजींनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या भगीरथ प्रयत्नांची दखल देशाच्या पंतप्रधानांनीही घेतली होती आणि संरक्षणदलांनीही. योगशजींंच्या मनात सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठीच्या अनेक योजना होत्या आणि त्यापैकी काही त्यांनी प्रत्यक्षातही आणल्या. पण अजूनही खूप काही करायचे होते. आता यापुढे सुमेधाताईंवर सारा भार असेन. आपणही त्यांच्या कार्यात सहभागी होणे गरजेचे आहे. या पडद्यामागच्या सैनिकाला आणि त्यांच्या त्यागाला शतश: वंदन आणि भावपूर्ण श्रद्धांजली… जय हिंद योगेश साहेब! हा देश आपले योगदान कधीही विसरणार नाही. आपल्या आत्म्यास सद्गती लाभेलच कारण हुतात्मा सैनिकांच्या आत्म्यांना ती लाभतेच.

(… या कार्याला प्रत्येक भारतीय देशप्रेमी नागरीकाचा हातभार लागणे गरजेचे आहे… कारण आपल्या सैनिकांना श्वास देणे म्हणजे आपलेच श्वास जपण्यासारखे आहे ! संपर्कासाठी लॅन्डलाईन टेलिफोन क्रमांक (020-25656831) मोबाईल क्रमांक योगेशजी चिथडे (9764294291) सुमेधाजी चिथडे (9764294292) 

ईमेल:- cyogeshg@rediffmail. com, cnborole@gmail. com 

Bank of Maharashtra A/c 60273878996 (IFSC-MAHA0000243) (MICR:-411014034) 

… देशसेवेचे आव्हान आहे म्हणूनच हे आवाहन आहे. वाचकांनी निश्चितपणे विचार करावा, ही विनंती.) 

– समाप्त –

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares