मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘डेल्टा-15‘ची कहाणी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले ☆

डाॅ. शुभा गोखले

? इंद्रधनुष्य ?

डेल्टा-15‘ची कहाणी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले 

अमेरिकेत “9/11‘ला दहशतवादी हल्ला झाला, त्या वेळची एक हृदयस्पर्शी कथा आहे. 

दोन विमाने वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन टॉवरवर आदळली आणि दोन्ही टॉवर जमीनदोस्त झाले, तर दुसऱ्या.मार्गावरून जाणारे आणखी एक विमान पाडण्यात आले. ही खबर मिळताच सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाली. जगभरातून जी विमाने अमेरिकेकडे येत होती, त्या सगळ्यांनाच रेडिओ मेसेज केले गेले, की अमेरिकेला येण्याचे रद्द करा, जवळच्याच विमानतळावर विमाने लॅंड करा आणि पुढील आदेशाची वाट पाहा.

“डेल्टा-15‘ या विमानालाही असाच संदेश आला. हे विमान कॅनडाहून येत होते. विमानाचा मार्ग बदलण्याचे कारण काय हे कुणालाच समजले नाही. वैमानिकही याबाबतीत अनभिज्ञ होता. कॅनडातील एका गावातील विमानतळावर विमान उतरले, तेव्हा प्रवाशांना कळाले, की अमेरिकेकडे जाणारी आणखी 52 विमाने तेथेच उतरली आहेत.

या सगळ्या विमानांतील प्रवाशांची संख्या दहा हजारांवर होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या गावात हा विमानतळ होता, त्या गावची लोकसंख्याही दहा हजारांच्या आसपास होती. म्हणजे अक्षरशः गावाच्या लोकसंख्येएवढे पाहुणे तेथे आले होते.

वैमानिकाला पुढील आदेश मिळेपर्यंत तीन दिवस लागले. तोपर्यंत या पाहुण्यांना सांभाळण्याची जबाबदारी गावावर होती. गावातील प्रशासनाने व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारली. सर्व शाळा बंद केल्या. जवळपासच्या घरांतून पलंग, खुर्च्या, जेवणाचे सामान प्रत्येक शाळेत पोचविले.

पाहुण्यांची उत्तम सोय करण्यात आली. या सर्व व्यवस्थेचे संयोजन रेड क्रॉस सोसायटी करीत होती.

“डेल्टा-15‘मध्ये एक गर्भवती तरुणीही होती. तिची विशेष काळजी घेण्यास सांगण्यात आले. तीन दिवस गावातील लोकांनी पाहुण्यांना गावभर फिरविले. बोटीमधून त्यांच्या सहली काढल्या. एकूण काय, गावाने पाहुण्यांना एकटे वाटू दिले नाही. आल्या प्रसंगाची झळ त्यांच्यापर्यंत पोचणार नाही, याची दक्षता घेतली. 

तीन दिवसांनंतर पुन्हा वैमानिकाला संदेश आला. त्याला अमेरिकेला परतायची परवानगी मिळाली होती. प्रवासी विमानात चढू लागले, तसे गावकऱ्यांना व प्रवाशांनाही रडू आवरेना. तीन दिवसांत त्यांच्यात एवढा स्नेह निर्माण झाला होता, की आता स्वगृही जायचे असूनही प्रवाशांचा पाय निघत नव्हता.

एवढ्या लोकांच्या आदरातिथ्याचा ताण पडला, तरी त्याचा त्रास गावकऱ्यांना वाटला नव्हता. गावकऱ्यांनी सर्व खर्च आपसांत वाटून घेतला. अशा कठीण प्रसंगात आपण कोणाच्या तरी उपयोगी पडलो अशी सर्वांची भावना होती.

विमानात गेल्यानंतर एका प्रवाशाने वैमानिकाला सांगितले, की “मी जे बोलणार आहे ते आपल्या नियमात बसत नाही. मला माझ्या सहप्रवाशांशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे. विशेष बाब म्हणून मला बोलण्याची परवानगी द्यावी.‘

सहसा वैमानिक अशी परवानगी देत नाहीत. परंतु तो प्रसंगच इतका हळवा होता, की वैमानिकालाही प्रवाशांच्या मनःस्थितीची पूर्ण कल्पना आली होती. ती परिस्थितीच अशी होती, की वैमानिकाने त्या प्रवाशाला बोलायला मनाई केली नाही. 

प्रवासी म्हणाला, “या गावाने तीन दिवस आपली एवढी सेवा केली आणि आपल्याला एवढे सांभाळले, की मला वाटते आपण सर्वांनी त्यांचे कायम कृतज्ञ राहायला हवे. आपण सर्वांनी आपापल्या शक्तीनुसार काहीतरी पैशांची मदत माझ्याकडे द्यावी. मी एक निधी उभारणार आहे. त्यात हे पैसे टाकून या गावातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करावी, असे माझ्या मनात आहे. मी जो ट्रस्ट उघडणार आहे त्याचे नाव ‘डेल्टा-15‘ हेच ठेवणार आहे.”

बघता बघता एकेक प्रवासी पुढे आला. ज्याने त्याने यथाशक्ती जमेल तेवढी रक्कम त्या प्रवाशाकडे सुपूर्द केली. सर्व प्रवाशांकडून आलेली रक्कम मोजली असता, थोडे थोडके नव्हे, तर तब्बल चौदा हजार डॉलर जमले होते. ज्याने हा प्रस्ताव मांडला होता, तो स्वतः अतिश्रीमंत उद्योजक होता. त्याने आपल्या पदरचे तेवढेच पैसे त्या गंगाजळीत घातले. नंतर त्याने वैमानिकाच्या मदतीने ज्या डेल्टा कंपनीचे विमान होते, त्या कंपनीलाही भरघोस निधी देण्याची विनंती केली. विमान कंपनीचे विमानही वाचले होते आणि त्यातील प्रवासी सुखरूप होते. त्यांना काही इजा झाली असती, तर कंपनीला मोठी भरपाई द्यावी लागली असती. विमान अमेरिकेला सुखरूप परतल्यावर कंपनीनेही त्या दानशूराच्या रकमेत भरीव निधी घातला.

‘डेल्टा 15‘ हा ट्रस्ट सुरू झाला, तेव्हा त्यांच्याकडे चक्क दीड कोटी डॉलर गोळा झाले होते.

दरवर्षी ट्रस्टच्या वार्षिक अहवालात किती मुले ट्रस्टच्या पैशातून शिकली हे प्रसिद्ध होत गेले. ज्या लोकांनी ट्रस्टसाठी पैसे दिले होते, त्यांना कॅनडाच्या त्या गावात काढलेले तीन दिवस आठवले. ट्रस्टसाठी आपण दिलेल्या पैशांचे चीज झाले, असे त्यांना वाटले व ते समाधान पावले. कॅनडामधील ते छोटेसे गाव आनंदाने हरखून गेले. ट्रस्टच्या पैशांच्या मदतीने त्या गावातील अनेक मुले विविध क्षेत्रांतील नामवंत म्हणून प्रसिद्ध झाली. अशी ही ‘डेल्टा-15‘ची हृदयस्पर्शी कहाणी.

आपल्याकडे असा काही आणीबाणीचा प्रसंग आला, की आलेल्या पाहुण्यांना कसे लुटले जाते, त्यांचा गैरफायदा कसा घेतला जातो, त्यांच्यासाठी दिलेली मदत दुसरीकडे कशी वळवली जाते, याच्या कथा आपण वर्तमानपत्रातून वाचतो आणि मनोमन दुःखी होतो. मग तो दुष्काळ असो, प्रलय असो अथवा दुसरे कुठले अस्मानी संकट असो. आपली मनोवृत्ती मदत करण्यापेक्षा लुटण्याकडे आहे, असे वारंवार सिद्ध होते.

 ‘डेल्टा-15‘ची ही कहाणी कदाचित आपल्या देशातही असेच देशप्रेम जागृत करेल एवढीच अपेक्षा आहे

लेखक : अज्ञात 

संग्राहिका :  डॉ. शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘मेड इन इंडिया’ लिहिण्यासाठी… – लेखक : श्री मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘मेड इन इंडिया’ लिहिण्यासाठी… – लेखक : श्री मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर  ☆

स्व.अर्देशिर गोदरेज

गोदरेज या भारतीय कंपनीने उत्पादनावर ‘मेड इन इंडिया’ लिहिण्यासाठी साठी  इंग्रजांशी पंगा घेतला.  गोदरेज कंपनी माहीत नाही अशी एकही व्यक्ती असणे शक्य नाही. भारतीय व्यापाराला उंचीवर नेऊन ठेवण्यात या कंपनीचा मोठा हात आहे. या कंपनीच्या संस्थापकांनी आपल्या प्रॉडक्टवर ‘मेड इन इंडिया’ लिहिण्यासाठी इंग्रजांशी पंगा घेतला. त्याची कहाणी :-

१८९४ मध्ये मुंबईच्या दोन तरुण वकिलांनी खळबळ माजवली होती. एकाने साउथ आफ्रिकेत तर एकाने ईस्ट आफ्रिकेत. दोघांचे विचारही एकच होते. वकिली पेशातं असलो तरी अजिबात खोटं बोलायचं नाही. त्यातील एक होते महात्मा गांधी व दुसरे होते अर्देशिर गोदरेज. ज्यांनी  गोदरेज समूह  बनवला. सत्यवचनी असणारे आर्देशीर आपल्या या स्वभावामुळे वकिली पासून लवकरच दूर झाले. व १८९४ मध्ये ते मुंबई येथे परत आले. एका फार्मासिटीकल कंपनीत केमिकल असिस्टंटची नोकरी सुरू केली. परंतु पारसी बाणा असल्यामुळे आपणही आपला स्वतःचा काही व्यवसाय करावा अशी त्यांची मनोमन इच्छा होती. काम केमिस्ट चे असल्यामुळे त्यांना एक कल्पना सुचली. आपण शस्त्रक्रियेसाठी लागणारी कात्री आणि ब्लेड तयार करूया. ही उत्पादने फक्त ब्रिटिश कंपन्याच तयार करत होती. म्हणून त्यांचा हा विचार पक्का झाला. 

सुरुवातीच्या भांडवलासाठी त्यांनी पारसी समाजातील एक हितचिंतक श्री मेरवानी यांच्या कडून ३००० रुपये कर्ज घेतले. आणि शस्त्रक्रियेसाठी लागणारी साधनं एका ब्रिटीश कंपनीसाठी तयार करायला सुरुवात केली. हे प्रॉडक्ट विकण्याची जबाबदारी त्या कंपनीची होती. गोदरेज यांचे म्हणणे असे होते की, ते त्यांच्या प्रोडक्टवर ‘मेड इन इंडिया’ असे  लिहितील. पण ब्रिटिश कंपनीचे म्हणणे होते की जर प्रोडक्टवर ‘मेड इन इंडिया’ असं लिहिलं तर उत्पादनाची विक्री होणार नाही. म्हणजे प्रॉडक्ट तर गोदरेज यांनी तयार करायचे पण विकणार मात्र ब्रिटिशांच्या नावाने. 

दोन्ही पक्ष आपापल्या बाजूला ठाम राहिल्याने त्याचा परिणाम असा झाला की गोदरेज यांना त्यांचा पहिला वहिला धंदा बंद करावा लागला. त्यांचं प्रोडक्ट चांगलं नव्हतं म्हणून नाही, तर माझ्या देशात तयार झालेल्या वस्तूला मी दुसर्‍या देशाचं नाव का देऊ? या तत्त्वाशी ठाम राहिल्यामुळे. 

पहिलि व्यवसाय बंद पडल्यानंतर आर्देशीर निराश झाले. त्यांनी आपली नोकरी चालूच ठेवली. पण डोक्यातून व्यवसाय जात नव्हता. एक दिवस वर्तमानपत्रातील एका बातमीने त्यावर त्यांची नजर गेली. मुंबईतील चोरीची घटना होती ती आणि त्या बरोबर मुंबई पोलीस आयुक्तांकडून एक निवेदन पण देण्यात आलं होतं की, “सर्व लोकांनी त्यांच्या घराच्या आणि कार्यालयाची सुरक्षा सुधारावी.” आर्देशीर च्या डोक्यात व्यवसायाचा किडा पुन्हा वळवळू लागला. कुलूप तयार करण्याची कल्पना त्यांच्या मनात आली. त्या वेळी भारतातील सर्व कुलपं हाताने तयार केली जात. ती सुरक्षित नव्हती. त्यांनी अशी कुलपं बनवायचं ठरवलं की, जे तोडणं कठीण असलं पाहिजे. कुलपं तयार करण्याच्या कल्पनेसह ते पुन्हा मेरवानजी कडे गेले. पहिले कर्ज न फेडल्याबद्दल त्यांनी त्यांची माफी मागितली आणि मग त्यांच्या समोर कुलपाची नवी योजना मांडली.

मेरवानी स्वत: एक व्यापारी होते. त्यांनी पण वर्तमान पत्रातील ती बातमी वाचली होती. थोड्या चर्चे नंतर मेरवानींनी त्यांना मदत करण्याचे कबूल केले. सक्सेस हाय वे पुस्तकात मेरवानी आणि त्यांच्यातील संवाद असा लिहिला आहे की, जेव्हा मेरवानींनी त्यांना विचारले, ‘‘मुला, तुमच्या जातीत किंवा घरात असं कोणी आहे का? की ज्यांनी कुलूप तयार केलं आहे?’’ त्यावर त्यांनी उत्तर दिलं, ‘‘मी पहिला आहे की नाही हे मला माहीत नाही, पण तुमच्या सारख्या महान माणसाच्या मदतीनं मी नक्कीच सर्वश्रेष्ठ बनून दाखवीन.’’

जिद्द आणि आत्मविश्‍वास याचं हे उत्तम उदाहरण आहे. तर अशा रितीने मेरवानी कडून आर्देशीर यांना परत कर्ज मिळाले. ७ मे १८५७ गोदरेज यांनी कामाला सुरुवात केली. बॉम्बे गॅस वर्क्सच्या बाजूला कुलपं बनवण्याचं काम सुरू केलं. गुजरात आणि मालबार हून १२ शिकलेले कारागीर आणले गेले. ‘अँकर’ या नावाने कुलपं बाजारात आली. या सगळ्यात महत्त्वाचं होतं ते एक वर्षाच्या गॅरेंटीचं पत्र ज्यामुळे त्याच्या विक्रीला मागणी आली. तेव्हा कोणत्याही कुलपाला गॅरेंटी नव्हती. गोदरेजचं कुलूप दुसर्‍या कोणत्याही चावीने उघडू शकत नव्हते.

अशा तर्‍हेने गोदरेजचं ताळं म्हणजेच कुलूप भारताच्या लोकांचं विश्‍वासाचं स्थान बनलं आणि आर्देशीर गोदरेज यांचा बिझनेस चांगला चालू लागला. आता त्यांना नवीनवीन उद्योगांची कल्पना सुचू लागली. मग गोदरेजचं कपाट बनवलं गेलं. कुलपं आणि कपाट हे गोदरेजचे ब्रँड झाले तरीही आर्देशीर गोदरेज यांना अजून काहीतरी नवीन करण्याची इच्छा होती. १९०६ मध्ये ते टिळकांच्या संपर्कात आले आणि स्वदेशी सिद्धांत अवलंबण्याची शपथ घेतली. आत्ता पर्यंत त्यांचा धाकटा भाऊ फिरोजशाह हाही त्यांच्या व्यवसायात सामील झाला. दोन्ही भावांचा कुलूप आणि कपाट व्यवसाय वाढत होता. भारतीयांवर ब्रिटिशांचे राज्य होते. त्यामुळे भारतीयांवर विविध प्रकारचे कर लागू होते.

आर्देशीर गोदरेज त्यामुळे खूप विचलित होते. १९१० मध्ये त्यांच्या आयुष्यात आणखी एक वळण आले. ज्यांच्याकडून त्यांनी कर्ज घेऊन व्यापार सुरू केला होता, त्याला एक भगिनी होती, तिचे नाव बॉयस होते. सीएच्या सल्ल्यानुसार गोदरेजनी बॉयसला आपला पार्टनर बनवले. मग कंपनीचे नाव ठेवले गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. काही दिवसांनी बॉयसने कंपनी सोडली, परंतु आर्देशीरने आजही कंपनीचे नाव तेच ठेवले, ‘गोदरेज अँड बॉयस’.

नंतर आर्देशीर लोकांच्या थेट संपर्कात आले. मग त्यांनी आंघोळीच्या साबणाचे उत्पादन सुरू केले. तेव्हा भारतात असलेल्या साबणात पशूंची चरबी वापरली जात असे. त्यामुळे हिंदूंची मन दुखावली जात म्हणून साबण तयार करण्याची व्यावसायिक संधीचा विचार त्यांनी केला. १९१८ साली गोदरेज कंपनीने दोन साबण तयार केले. असे एकेक उत्पादन वाढू लागली आणि गोदरेजचा कारभार वाढू लागला. हळूहळू कुटुंबातील मेंबर या बिझनेस मध्ये सामील झाले. मग वॉशिंग मशीन, फ्रीज, हेअर डाय, फर्निचर अशी उत्पादनं वाढू लागली आणि गोदरेज कंपनी नावारूपास आली आणि ‘मेड इन इंडिया’ हे वाक्य लिहायला नकार देणार्‍या ब्रिटिशांच्या नाकावर टिच्चून गादरेज कंपनीने आपला व्यवसाय दिवसेंदिवस वाढवला. मनात तत्त्व होतं, एक सचोटी होती आणि देशाबद्दल प्रखर अभिमान होता. म्हणूनच हे सगळं शक्य झालं. व्यवसायात पाऊल ठेवलं आणि तो व्यवसाय नावारूपाला आणला, इतका की, आज इतकी वर्षं झाली तरी गोदरेजचं स्थान अढळ आहे. 

संकलन – मिलिंद पंडित

कल्याण

प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘एक मोठी रेष…’ – लेखिका – सुश्री मेघना भुस्कूटे ☆ संकलन व प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘एक मोठी रेष…‘ – लेखिका – सुश्री मेघना भुस्कूटे ☆ संकलन व प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

सुनीताबाईंबद्दल मी नव्यानं काय लिहिणार? त्यांचं सगळं आयुष्य महाराष्ट्राच्या पुढ्यात आहे. त्यातला निरलस कष्टाळूपणा, कठोर तत्त्वनिष्ठा, धारदार संवेदनशीलता, कमालीचं औदार्य, शास्त्रकाट्याची कसोटी लावणारी न्यायबुद्धी, कोवळं कविताप्रेम, परिपूर्णतावादी वृत्ती, पुलंच्या कामाचं त्यांनी केलेलं व्यवस्थापन, जीएंशी असलेली त्यांची अपूर्वाईची पत्रमैत्री… सगळंच आपण अनेक दशकं जवळून पाहिलेलं, आदरानं-अप्रूपानं अनुभवलेलं. त्याबद्दल नव्यानं सांगण्याजोगं काही नाही. ते अधिक जवळून बघण्याचं भाग्य मिळालेले, अधिक नेमकीपणी सांगता येणारे, अधिक काळ त्यांना पाहिलेले… अनेक लोक आहेत. मी त्यांच्याहून वेगळं काय सांगणार?

मी वेगळं सांगू शकीन ते बहुतेक माझ्या मनातल्या त्यांच्या प्रतिमेबद्दल आणि त्यातून मला मिळालेल्या गोष्टींबद्दल. 

सुनीताबाईंचं लेखन मी वाचलं ते पुलंच्या भक्तीत पूर्णतः बुडून गेल्यावर. ऐन घडणीच्या वयात. चौदा-पंधराव्या वर्षी. आम्हांला दहावीत असताना ‘आहे मनोहर तरी’मधला एक अंश मराठीच्या पुस्तकात अभ्यासाला होता. त्या निमित्तानं ‘आहे मनोहर तरी’ हातात आलं आणि मला माझ्या पिंडाला मानवणारं, अगदी जवळचं वाटणारं काहीतरी मिळाल्याचा भास झाला. त्या लेखनातली बंडखोरी, स्वातंत्र्यावरचं प्रेम आणि त्याकरता किंमत मोजण्याची तयारी, अतिशय नाजूक आणि सूक्ष्म भावनांचे पदर उलगडून बघण्याची हातोटी आणि त्यामागची अपरिहार्यता… हे सगळं माझ्या तोवरच्या वाचनापेक्षा पूर्ण वेगळं होतं. माझ्या संवेदनाखोर स्वभावाला ते लेखन फार जवळचं वाटलं. 

त्यापेक्षाही निराळी आणखी एक गोष्ट घडली, असं आता जाणवतं. 

आपण घडतो त्यात निरनिराळ्या बाबींचा हात असतो. प्रत्यक्ष आयुष्यातली उदाहरणं आणि बरावाईट वारसा असतो, तसाच नजरेसमोर वावरणार्‍या – समाजातल्या इतर प्रतिष्ठित उदाहरणांचाही भाग असतो. त्यातल्या कुणाचे प्रभाव आपण आपल्यावर पाडून घ्यायचे हे निवडणारे आपणच असतो. पण मुळात अशा प्रकारची उदाहरणं भोवतालात असावी लागतात. 

सुनीताबाई तशा होत्या. 

त्यांचं स्वतःचं कर्तृत्व आणि गुणवत्ता नाकारण्याची आजघडीला कुणाचीही छाती होणार नाही. पण ‘आहे मनोहर तरी’ प्रकाशित झाल्याच्या अल्याडपल्याडच्या काळात पुलंची लोकप्रियता वादातीतपणे त्यांच्याहून मोठी होती. पुल या नावाला एक जादुई वलय होतं. तसं तर ते आजही आहेच. तेव्हा ते किती प्रभावी असेल, याची कल्पना आपण सहजगत्या करू शकतो. पुलंना आणि त्यांची पत्नी म्हणून सुनीताबाईंना मराठी माणसांच्या जगात मानाची जागा होती. मंगला गोडबोलेंनी सुनीताबाईंच्या चरित्रामध्ये पुल आणि सुनीताबाई यांना ‘महाराष्ट्राचं फर्स्ट कपल’ अशी अतिशय चपखल संज्ञा वापरली आहे. खरोखरच त्या दोघांचं स्थान तसंच होतं. अशा ठिकाणी असणार्‍या सुनीताबाईंनी आपल्या लोकप्रिय कलावंत नवर्‍याच्या सोबत संसाराची धुरा निमूट वाहिली असती आणि मनोभावे त्याच्यासह मिरवलं असतं, तरीही त्यांचा उदो-उदोच झाला असता. पण त्यांनी हा सहज मिळू शकणारा मान नाकारला. त्यांनी या भूमिकेच्या बरोबर उलट वागून दाखवलं. 

‘आहे मनोहर तरी’मधून त्यांनी नवरा म्हणून पुलंच्या वागण्याचं रोखठोक विश्लेषण केलं. आणि पुलंचे दोष त्यांच्या पदरात घातले. वास्तविक पुल हे अशा पिंडाचे होते, की त्यांनी सुनीताबाईंच्या कोणत्याही निर्णयांना कधीही काडीमात्र विरोध केला नाही. व्यक्तिस्वातंत्र्याच्या आड येणं तर त्यांच्या स्वभावात नव्हतंच, पण सुनीताबाईंनी स्वतः पुलंच्या बाबतीत घेतलेले निर्णयही त्यांनी विनातक्रार मानले. या व्यवस्थेत सुनीताबाईंची दोन्ही अंगांनी सोयच होती. स्वातंत्र्य तर होतंच, शिवाय कर्कशा न व्हावं लागण्याची सोयही होती. ही व्यावहारिक सोय वापरून मूलभूत प्रश्नांना बगल देता येणं एखादीला सहज शक्य झालं असतं. पण सुनीताबाईंनी तसं केलेलं दिसत नाही. त्यांनी पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या चौकटीबद्दलच प्रश्न उपस्थित केले. ‘वेळोवेळी मी माझे आणि भाईच्याही आयुष्याबाबतचे निर्णय घेत गेले, हे जरी माझ्या पथ्यावर पडत असलं, तरी भाई मात्र वेळोवेळी एखाद्या जाणत्या सहचरासारखं न वागता एखाद्या लहान मुलासारखं आत्मकेंद्री पद्धतीनं वागला आहे,’ या आशयाचा सल त्यांनी कुठलाही आडपडदा न ठेवता मोकळेपणी बोलून टाकला. पुलंना गाडी चालवता येत नसतानाही निव्वळ पुरुष असल्यामुळे त्यांना मिळालेल्या ‘शिकिवनाऱ्या बाबा’च्या उपाधीबद्दलचा किस्सा प्रसिद्ध आहे. पण उल्लेखनीय बाब म्हणजे, त्यात पुलंबद्दल कुठलाही कडवट सूर नव्हता. पुलंच्या प्रतिभेबद्दल सुनीताबाईंना आदर आणि अप्रूप होतं. तिला निगुतीनं जपण्याचं काम सुनीताबाईंनी जन्मभर केलं. पण आश्चर्य म्हणजे, पुलंच्या, एखाद्या लहान मुलासारख्या आत्मकेंद्री परावलंबित्वाबद्दल तक्रार नोंदवतानाही पुलंबद्दल त्यांच्या मनात करुणा होती. त्वेष वा राग नव्हता. लग्नगाठीतून जन्माला येणारे स्त्रीवरचे अन्याय हे पुरुषसत्ताक व्यवस्थेची फळं कशी असतात, याबद्दलचं किंचित कडसर – कडवट नव्हे – भान त्या प्रकटनात भरून राहिलं होतं. दलित लेखकांना उद्देशूनही त्यांनी त्या आशयाचे प्रश्न विचारले होते. ‘तुम्ही शोषित. आम्ही स्त्रियाही शोषित. तुम्हांला तरी आमची दुःखं कळतील असं वाटलं होतं…’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली.  त्या पुस्तकातली ‘आहे मनोहर तरी गमते उदास’मधल्या उदासरम्य भावाची एक छटा त्यातूनही आलेली होती. 

दुसरं म्हणजे स्त्री म्हणून स्वतःला पडलेल्या शारीर मोहांबद्दल लिहिणं. सुनीताबाई चळवळीत काम करत असताना त्यांना भय्या या आपल्या मित्राविषयी मोह पडला आणि काहीही चुकीचं पाऊल न उचलता त्या मोहातून पार झाल्या, याला कारण भय्याचा भलेपणा, असं त्यांनी प्रामाणिकपणानं नोंदवलं.      

पुल-सुनीताबाईंना मूल नव्हतं. अगदी सुरुवातीच्या काळात एका अगदी साध्याश्या प्रसंगी मन दुखावलं जाण्याचं निमित्त झालं आणि सुनीताबाईंनी मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला. पुढे कारणाकारणांनी ते राहतच गेलं. हा किती मोठा निर्णय! पण सुनीताबाईंच्या त्या निर्णयामागे कुठलाही अभिनिवेश जाणवत नाही. व्यक्तिस्वातंत्र्याचा बडिवार न माजवता ते अगदी विनासायास वागवणार्‍या व्यक्तीची सहजता त्यात दिसते. तसंच लग्नसंस्थेबद्दलच्या त्यांच्या चिंतनाचंही. ‘मला त्या बाह्य बंधनाची गरज नव्हती. भाईला हवं होतं, म्हणून लग्न केलं; त्याला ते नको असतं, तर मी सहज घटस्फोट देऊ शकले असते,’ असं त्या शांतपणे म्हणून गेल्या. त्यांना स्वतःच्या असामान्यत्वाची लख्ख जाणीव होती, पण त्याच वेळी पुलंच्या स्वभावातल्या मूलपणाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांना सोडून जाण्यातलं क्रौर्यही जाणवत होतं. त्या काळातल्या – आणि खरं तर आजच्याही – स्त्रीस्वातंत्र्याच्या रूढ कल्पना पाहिल्या, तर कितीही मोठा सर्जनशील कलावंत का असेना, पण अशा कलावंत नवर्‍याच्या कारकिर्दीची व्यवस्था पाहणारी स्त्री, हे वर्णन त्यांच्यासारख्या स्वतंत्र विचारांच्या कर्तृत्ववान व्यक्तीला किती बोचणारं-सलणारं ठरू शकेल! पण त्यामध्ये त्यांनी कधीही कुठलंही शरमिंधेपण बाळगलेलं दिसत नाही. एखाद्या कवितेची निर्मिती मिरवावी तितक्याच अभिमानानं त्यांनी स्वतः निरीक्षणं करून बसवलेल्या तूप कढवण्यासारख्या खास कौशल्यांबद्दलही लिहिलं. मन लावून केलेलं, दर्जा राखून केलेलं कुठलंही काम श्रेष्ठच या मूल्यावरचा ठाम विश्वास त्यामागे होता. हे अशाच एखाद्या व्यक्तीला जमेल, जिच्या विचारांमध्ये लखलखीत स्पष्टता आहे. सुनीताबाईंनी ते सहजगत्या तोलून धरलं होतं. 

हे जगावेगळं होतं.   

सुनीताबाईंनी आपल्या नवर्‍याच्या प्रतिमेची तमा न बाळगता असं जाहीर लिहिण्यामुळे – आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या पुलंनी ते अत्यंत उमदेपणानं स्वीकारण्यामुळे – फार वेगळा पायंडा पडला. अजिबात कडवट न होता, पण कुठलीही तडजोड न करता केलेला, स्त्रीवादी विचाराचा फार उन्नत आविष्कार बघायला मिळाला; तोही समाजात मानाच्या स्थानी विराजमान असलेल्या एका जोडप्याकडून. याचं मोल माझ्यासारख्या लोकांच्या दृष्टीनं फार मोठं होतं. स्वतंत्र विचार करणाऱ्या स्त्रीचं आणि ते कुठल्याही अहंकाराशिवाय स्वीकारणाऱ्या पुरुषाचं असंही सहजीवन असू शकतं, असा एक महत्त्वाचा धडा त्यातून मला मिळाला. 

पुढे सुनीताबाईंचं लिहिणं, त्यांची प्रश्नोपनिषद विणत नेणारी शैली, मित्रांच्या काळजी-प्रेमापोटी अतीव कोवळी होऊ शकणारी आणि स्वतःला प्रश्न विचारताना मात्र धारदार शस्त्राचं रूप धारण करणारी  त्यांची संवेदनशक्ती… या गोष्टी वाचनात आल्या. अधिकाधिक आवडत गेल्या. जी. ए. आणि सुनीताबाई या दोघांच्या पत्रव्यवहाराच्या रूपानं निराळ्याच उंचीवरच्या मैत्रीचा आविष्कार बघायला मिळाला, अतिशय कृतज्ञ वाटलं. पण ती सगळी पुढची गोष्ट.   

पुलंच्या नाटकाची रॉयल्टी बुडवून नाटकांचे दडपून प्रयोग होत असत. अशा प्रयोगात सामील होणाऱ्या भल्या-भल्या लोकांना सुनीताबाईंनी कोर्टाच्या नोटिसा बजावल्या. मग ते प्रसिद्ध नट असोत वा पुलंचे मित्र असोत. तसंच दुसऱ्या टोकाचं उदाहरण म्हणजे त्यांनी दिलेल्या एका देणगीचं. पी. एल. फाउंडेशनला भराव्या लागणाऱ्या कराच्या दृष्टीनं विचार करता ही देणगी पुढच्या आर्थिक वर्षात देणं सोयीचं होतं, म्हणून त्यांनी देणगी उशिरा दिली, पण देणगी देण्याचा निर्णय झाल्यापासूनच्या प्रत्येक दिवसाचं व्याजही देणगीत जमा करूनच. एकदा एखाद्या मूल्याविषयी संपूर्ण विचार करून त्याचा स्वीकार केला, की त्याच्या अंमलबजावणीत मागेपुढे पाहणं नाही. पदरी वाईटपणा येवो वा चांगुलपणा येवो. 

न भिता आणि स्वच्छ विचार करता आला, की तो कुठल्याही टोकापर्यंत नेता येण्याचं धैर्य मिळत असेल? कुणास ठाऊक. मला तो विश्वास त्यांच्या लिहिण्यातून मिळाला खरा. त्यांचं स्थान बघता, तो त्यांच्यामुळे अनेकांना मिळाला असणार. 

त्या स्वतः सिद्धहस्त प्रतिभावंत लेखक होत्या, असं म्हणता येत नाही. त्यांनी स्वतःही तसं कधी मानलं नाही. पण तसं नसताही, आपली योग्यता आणि आपल्या मर्यादा नीट समजून घेतल्या आणि स्वतःशी निर्भयपणे प्रामाणिक राहिलं, तर किती प्रकारे निर्मितिशील असता येतं, याचा वस्तुपाठच जणू त्यांनी त्यांच्या जगण्यातून घालून दिला. इतर अनेक लेखकांबद्दल वाटतो तसा सहज मित्रभाव त्यांच्याबद्दल वाटत नाही, एक प्रकारचा धाक वाटतो. त्यांनी जगताना आखून दिलेली रेष तितकी मोठी होती, याचंच ते द्योतक मानलं पाहिजे! 

बाकी कशापेक्षाही हे मला त्यांचं मोठं योगदान वाटतं.

लेखिका – सुश्री मेघना भुस्कूटे

संकलक व प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ११ — विश्वरूपदर्शनयोग — (श्लोक ४१ ते ५५) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ११ — विश्वरूपदर्शनयोग — (श्लोक ४१ ते ५५) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति।

अजानता महिमानं तवेदंमया प्रमादात्प्रणयेन वापि ॥४१॥

*

यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु ।

एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षंतत्क्षामये त्वामहमप्रमेयम्‌ ॥४२॥

*

तव महानता नव्हतो जाणुन प्रमाद घसटीचा

यादवा हे कृष्ण सख्या अजाणता संबोधण्याचा

विनोद विहार शय्या मजसंगे केलीत मायेने

अनमान जाहला माझ्याकडुनी उद्धरा क्षमेने ॥४१,४२॥

*

पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान्‌।

न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्योलोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभाव ॥४३॥

*

जगत्पित्या हे महाजगद्गुरो देवा पूजनीय अनुपम 

त्रैलोक्यी श्रेष्ठ वा नाही कोणी प्रभावी तुमच्या सम ॥४३॥

*

तस्मात्प्रणम्य प्रणिधाय कायंप्रसादये त्वामहमीशमीड्यम्‌।

पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियः प्रियायार्हसि देव सोढुम्‌॥४४॥

*

प्रसन्न व्हावे क्षमा करावी जगदीश तव  चरणी देहार्पण

पिता पुत्राचा सखा सखीचा जैसे करीत अपराध सहन ॥४४॥

*

अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे।

तदेव मे दर्शय देवरूपंप्रसीद देवेश जगन्निवास ॥४५॥

*

कधी न देखीले तुमच्या या विराटस्वरूप दर्शने

हर्षनिर्भर मनोमनी तैसा व्याकुळ झालो भयाने

जगदीशा परमेशा घ्या आवरून विश्वरूपाला 

प्रसन्न व्हा चतुर्भुज विष्णुरूप दर्शन द्या मजला ॥४५॥

*

किरीटिनं गदिनं चक्रहस्तमिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव।

तेनैव रूपेण चतुर्भुजेनसहस्रबाहो भव विश्वमूर्ते॥४६॥

*

शिरावरी किरीट हाती गदा तथा चक्र हेच रूप दावा

विश्वस्वरूपा सहस्रबाहो मजला चतुर्भुज रूप दावा ॥४६॥

श्रीभगवानुवाच

मया प्रसन्नेन तवार्जुनेदंरूपं परं दर्शितमात्मयोगात्‌ ।

तेजोमयं विश्वमनन्तमाद्यंयन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम्‌ ॥४७॥

कथित श्रीभगवान

प्रसन्न होउनी तुजवर पार्था तुज दिधले दर्शन 

अनादिअंत परम तेजोमय योगशक्तीचे प्रमाण

तुझ्या आधी ना कधी पाहिले कोणी या रूपाला

करुनी तुझिया वरी अनुग्रह दाविले विराट रूपाला ॥४७॥ 

*

न वेदयज्ञाध्ययनैर्न दानैर्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः।

एवं रूपः शक्य अहं नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरुप्रवीर ॥४८॥

*

दानाने ना वेदाध्ययनाने कर्माने ना उग्र तपाने

विश्वरूप हे माझे पार्था कुणा ना गोचर अन्य कशाने ॥४८॥

*

मा ते व्यथा मा च विमूढभावोदृष्ट्वा रूपं घोरमीदृङ्‍ममेदम्‌।

व्यतेपभीः प्रीतमनाः पुनस्त्वंतदेव मे रूपमिदं प्रपश्य ॥४९॥

*

नकोस होऊ व्याकूळ ना होई बुद्धीभ्रष्ट विक्राळ रूपाने

त्यागुनिया भय प्रीतीने तुष्ट होई चतुर्भुज माझ्या रूपाने ॥४९॥

संजय उवाच

इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः ।

आश्वासयामास च भीतमेनंभूत्वा पुनः सौम्यवपुर्महात्मा ॥५०॥

कथित संजय

कथूनी ऐसे  वासुदेवे दाविले चतुर्भुज रूप अर्जुनासी

पुनरपि होउनी सौम्यस्वरूपी धैर्य दिधले कौन्तेयासी ॥५०॥

अर्जुन उवाच

दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन।

इदानीमस्मि संवृत्तः सचेताः प्रकृतिं गतः॥५१॥

कथित अर्जुन 

दर्शनाने तव सौम्यस्वरूपी मानवी हे जनार्दना

चित्ता लाभले स्थैर्य माझिया स्वाभाविकता मन्मना॥५१॥

श्रीभगवानुवाच

सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम।

देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्‍क्षिणः॥५२॥

कथित श्रीभगवान 

दर्शन झाले तुजला पार्था सुदर्शनधारी चतुर्भुज रूपाचे

देवदेवता दर्शनाकांक्षी दुर्लभ सहजी ना कुणा व्हायचे ॥५२॥

*

नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्यया।

शक्य एवं विधो द्रष्टुं दृष्ट्वानसि मां यथा ॥५३॥

*

तुला जाहले दिव्य दर्शन चतुर्भुज या रूपाचे

वेद तप वा दान यज्ञे दृष्टी गोचर नच व्हायाचे ॥५३॥

*

भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवंविधोऽर्जुन ।

ज्ञातुं द्रष्टुं च तत्वेन प्रवेष्टुं च परन्तप ॥५४॥

*

भक्तीनेच केवळ अनन्य परन्तपा साध्य चतुर्भुज दर्शन 

ज्ञान तयाचे प्रवेश तयात  होई तयाने अद्वैताचे दिव्य ज्ञान ॥५४॥

*

मत्कर्मकृन्मत्परमो मद्भक्तः सङ्‍गवर्जितः ।

निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव ॥५५॥

*

कर्म समर्पित माझ्या ठायी माझ्या चरणी लीन

मोहाचा ना सङ्ग जयाला मम भक्तीने परिपूर्ण 

चराचरांप्रति वैरभाव ना सौहार्दाने जो युक्त

अनन्यभक्तीयुक्त अर्जुना तयासि मी होतो प्राप्त ॥५५॥

*

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायांयोगशास्त्रे 

श्रीकृष्णार्जुनसंवादे विश्वरूपदर्शनयोगो नामैकादशोऽध्यायः ॥११॥

 

ॐ श्रीमद्भगवद्गीताउपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादरूपी विश्वरूपदर्शनयोग नामे निशिकान्त भावानुवादित एकादशोऽध्याय संपूर्ण ॥११॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘ढिंचणिया’ — लेखक : मकरंद करंदीकर ☆ श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

 

 ‘ढिंचणिया’ — लेखक : मकरंद करंदीकर ☆ श्री सुनीत मुळे ☆

मांडी घालून जेवतांना अजब टेकू –…!!

भारतात पूर्वींपासून चालत आलेल्या भोजन पद्धती आणि जेवणासाठी वापरली जाणारी  वैशिष्ट्यपूर्ण भांडी, स्वयंपाकघरातील वेगळ्या वस्तू आणि अनेक प्रथा, आताशा लुप्त होत चालल्या आहेत. जमिनीवर मांडी घालून बसणे हा एक सर्वमान्य, सार्वकालिक अस्सल भारतीय प्रकार ..!! म्हणूनच आपण तिला ‘भारतीय बैठक’ म्हणतो ..!! 

मांडी घातल्यावर दोन्ही पावले, गुडघ्यांच्या खाली अशा तऱ्हेने घेतली जायची की त्यामुळे, दोन्हीही मांड्यांना आधार मिळत असे. हा सगळा इतका मोठा व्यायाम होता की ज्यामुळे सांधेदुखी, कंबरदुखी,गुडघ्यातील वेदना, ‘नी रिप्लेसमेंट’ असल्या  गोष्टी लांब राहत असत. कांही अपवाद वगळता भोजनासाठी, न्याहारीसाठी जमिनीवर, पाटावर,आसनावर बसण्याची पद्धत होती ..!! 

खरेतर, माणसाच्या नाभी पासून गुडघ्यापर्यंतच्या शरीराचे सर्वाधिक वजन असते. जमिनीवर बसल्यानंतर, नाभीपासून डोक्यापर्यंतचे वजनही त्यावरच येते ..!! 

मांडी घालून बसल्यावर,अधिक स्थूल मंडळींची गंमतच होत असे. त्यांचे दोन्हीही गुडघे जमिनीपासून खूप वरती राहत असत. अशा टांगलेल्या  अवस्थेत जास्तवेळ जमिनीवर बसणे अशक्य होते. त्यावर शोधून काढलेली वस्तू म्हणजे ‘ढिंचणिया’ म्हणजे ढोपर टेकू ..!! 

जेवायला जमिनीवर मांडी घालून बसल्यावर, अधिक स्थूल मंडळींची गंमतच होत असे. त्यांचे दोन्ही गुढघे जमिनीपासून खूप वरती राहत असत. अशा टांगलेल्या अवस्थेत जास्त वेळ जमिनीवर बसणे अशक्य होते. अशा अवस्थेत राहणाऱ्या मांड्यांच्या खाली द्यायचा आधार म्हणजे ‘ढिंचणिया’ ..!! हा एक ढिंचणिया साधारणत: डमरूसारखा, ५ ते ७ इंच उंच आणि ३ ते ४ इंच रुंद इतक्या आकाराचा असे. दोन गुडघ्यांखाली घेण्यासाठी याची जोडी बनवली जात असे. याचा तळ समईच्या तळासारखा जाड आणि एकसंध असायचा. त्यामुळे ते पटकन उलटत नसे ..!! मांडीला टोचू नये म्हणून याचा वरचा भाग हा कडेने आणि वरून गोल गुळगुळीत असे. सर्वात महत्वाची गोष्ट अशी की वरचा अर्धा भाग हा नक्षीचा जाळीदार असायचा. बराच काळ मांडीखाली ठेवल्याने तो शरीराच्या उष्णतेने तापू नये म्हणून ही जाळी असे. हे पितळ आणि कांशापासून बनविले जात असत. तत्कालीन कारागिर त्यावर खूप चांगली नक्षी कोरत असत. तांबे आणि हस्तिदंतापासूनही हे  ढिंचणिया बनविले जात असत. लाकडापासून बनविलेले  ढिंचणिया हे स्वस्त असल्याने अधिक लोकप्रिय होते. त्यावरही अतिशय आकर्षक रंगांमध्ये सुंदर नक्षी रंगविलेली असे. गुजरात (विशेषतः सौराष्ट्र) आणि राजस्थान ह्या भागांमध्ये हे ढिंचणिया वापरले जात असत ..!! अगदी खेडेगावात जेथे ढिंचणिया उपलब्ध नसतील तेथे, एखादा धातूचा डबा, लाकडी ठोकळा, कापडाचा बोळा अशा वस्तूही वापरल्या जात असत ..!!  

आपण एक हस्तटेकूही पहिला असेल. आसनावर हातात जपमाळ घेऊन बसलेल्या संत रामदासस्वामी आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हाताखाली दिसणाऱ्या इंग्रजी टी आकाराच्या टेकूला कुबडी म्हणतात. ह्याच्या आत स्व-संरक्षणासाठी शस्त्रही लपविले जात असे ..!! 

शहरांमध्ये आता जमिनीवर बसणे कायमचे बाद होत चालले आहे. छोटी नगरे आणि खेडीही ‘मॉडर्न’ होत चालली आहेत. आता या ढिंचणियांची गरजच संपली आणि ते दृष्टीआड होता होता सृष्टीआडही होत आहेत ..!!  अजून निदान त्याचा वापर तरी माहिती आहे. कांही वर्षांनी बहुधा या ‘अज्ञात वस्तू’ म्हणून तेथे शिल्लक राहतील ..!! 

लेखक : मकरंद करंदीकर 

प्रस्तुती : सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जिवतीची पूजा ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे)

? इंद्रधनुष्य ?

☆ जिवतीची पूजा ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

श्रावण जवळ येत आहे , शहरांमध्ये हल्ली बहुतांश घरांमध्ये जिवती पूजन बंद झालेले दिसते, अनेकांना माहितीही नाही हे काय असते, त्यासाठी हा प्रपंच। 

जिवतीच्या प्रतिमेचे पुजन आणि त्याचा अर्थ. कोण हि जिवती? हिच्या पूजनाचा हेतू काय?

आषाढ महिन्याच्या अमावस्येला हे दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी जरा-जिवंतिका पूजन सुद्धा करतात.

दिवा हे ज्ञानाचं, वृधिंगततेच प्रतीक आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप. तुम्ही एक दिवा उजळा त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता त्यामुळेच याला वंश वृद्धीचं प्रतीक मानतात. या प्रतीकाचं पूजन म्हणजेच दीपपूजन दुसरी पूज्य देवता म्हणजे जिवती.

जिवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेच पूजन मातृशक्ती कडून केल्या जातं व आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या, वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते. यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही. काय रहस्य असेल या प्रतिमा क्रमाचे?

जिवती प्रतिमेत प्रथम नरसिंह, नंतर कालियामर्दन करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा- जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध – बृहस्पती (गुरु) यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पुजले जाते त्याची कारण मिमांसा…

प्रथम भगवान नरसिंहचं का?

भगवान विष्णूंचा चवथा अवतार असलेले नरसिंह, आपल्या बाळ भक्तासाठी प्रगट झाले. हि कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकशिपू पासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक आणि बाल भक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पुजले जातात.

म्हणजेच…

नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात जसे उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादी

त्यानंतर येतात कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण-

यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्हीपण श्रावणातील आराध्य दैवत. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन करणारा श्रीकृष्णच का? आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल कि या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळात असतांना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या- बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरटपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, त्याचबरोबर महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडत असतांना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पुजला जातो.

म्हणजेच…

कालियादमनक कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळतांना येणाऱ्या आपत्ती, पाण्यापासूनचे संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव करतात. घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्हीदेव बालकांचे रक्षण करतात म्हणून जिवती प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान.

नंतर येतात त्या जरा व जिवंतिका –

जरा व जिवंतिका या यक्ष गणातील देवता. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते. मगधनरेश बृह्दरथ याला दोन राण्या असतात. दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते. परंतु राजाला पुत्र/ पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतीत असतो. याच सुमारास नगरजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते. राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रगट करतो. ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो. कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा- अर्धा. अशा विचित्र आणि अर्धवट अभ्राकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोनीही शकलं सांधते. जरा ते सांधलेले अभ्रक संध्यासमयास बृह्दरथ राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंघ ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रीत्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मन देतो. त्याच प्रमाणे जारदेवतेचा वार्षिक महोत्सव सुरु करतो, अशी हि जरा देवी. जारेंचीच सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवतो अशा रूपात दाखवतात.

प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध व बृहस्पती –

बुध ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो. तर बृहस्पती (गुरु) वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, अध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते.

बुधाचं वाहन हत्ती – हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने, व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरुन लक्षात येते.

बृहस्पतीचं वाहन वाघ – हे अहंकाराचा प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो. अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या, गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते.

म्हणूनच बुध – बृहस्पती यांना सुद्धा जिवती प्रतिमेत स्थान मिळालं.

प्रथम रक्षक देवता.

नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता.

आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा हा जिवती प्रतिमेचा क्रम.

एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जिवती पूजन. जगातील सर्व प्राणिमात्रांच्या उज्वल भविष्याची, रक्षणाची प्रार्थना …म्हणजेच जिवती पुजन.  

तुम्हाला पूजण्याची ईच्छा असेल पण बाजारात जीवतीचा कागद मिळत नसेल तर याचाच प्रिंटआउट घ्या पूजन करा, गंध-पुष्प-धूप-दीप- दुधसाखरेचा नैवेद्य दाखवा. घरातील मुला बाळांना नमस्कार करायला सांगा त्यांना दुधसाखरेचे तीर्थ द्या व श्रावण संपल्यावर याचे विसर्जन करा (श्रावण अमावास्येला हा कागद उपडा करून ठेवायची व दुसऱ्या दिवशी विसर्जन करण्याची प्रथा आहे, श्रावणा नंतर मुलांना दिसता कामा नये).

कवी : म. ना. देशपांडे

(होरापंडीत मयुरेश देशपांडे)

+९१ ८९७५३ १२०५९ 

https://www.facebook.com/majhyaoli/ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ टिटवीची ‘टिवटिव’ – लेखक : श्री अनंत गद्रे ☆ प्रस्तुती – सुश्री जुईली केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ टिटवीची ‘टिवटिव’ – लेखक : श्री अनंत गद्रे ☆ प्रस्तुती – सुश्री जुईली केळकर ☆

गावखडीचे कासवमित्र डिंगणकर आंम्हाला तिथल्या सागरी कासवे संवर्धन मोहिमेची माहिती सांगत होते. 

ॲालिव्ह रिडले ही सागरी कासवांमधील आकाराने लहान असलेली कासवाची जात. जगभरच्या समुद्रांमधे आढळणारी ही कासवे. लहान म्हटली तरी ती दोन फुटा पर्यंत लांबी आणि पस्तीस ते चाळीस किलो वजनांची असतात. त्याच्या ॲालिव्ह करड्या रंगामुळे त्यांना हे नाव पडलेले. 

नोव्हेंबर ते मार्च हा त्यांचा विणीचा हंगाम. या काळात ती समुद्रकिनाऱ्यावर अंडी घालण्याकरता येतात. अनेकांनी एकत्रीतपणे किनाऱ्यावर येऊन अंडी घालणे ही त्यांची विशेषता. विणीच्या काळात अंधाऱ्या रात्री भरतीच्या वेळी ती समुद्रातून किनाऱ्यावर अवतरतात. योग्य तापमानाच्या वाळूत खड्डा खणून घरटी बनवतात. त्यात अंडी घालून खड्डा पुन्हा वाळूने भरतात. आणि समुद्रात परत निघून जातात. ती परत कधीही घरट्याकडे परतत नाहीत. 

एकावेळेस शे दीडशे अंडी एक कासवीण घालते. अश्या अनेक कासवीणी हंगामात अंडी घालतात. पंचेचाळीस ते साठ दिवसांनी अंड्यातून पिल्ले घरट्यातून बाहेर येतात आणि समुद्रात जातात. 

अर्थात जी काही अंडी वाचतात, पिल्ले जगतात ती. कारण ही अंडी घरट्यातून पळवली जातात. माणसे तर पळवतातच. त्याच जोडीने कुत्रे, कोल्हे, रानडुकरे, खेकडे हे ही पळवतात. वाळू उकरून घरट्यातली अंडी पळवली जातात. 

आता मात्र कासवांच्या अंड्यांचे संरक्षण व संवर्धनाचे कार्य करण्यात येत आहे. त्यात चिपळूणच्या सह्याद्री निसर्गमित्र संस्थेचा व स्थानिकांचा मोठा सहभाग आहे. प्रकाश डिंगणकर हा त्यापैकीच एक. 

एक उत्सुकता म्हणून आम्ही त्यांना विचारले की, विणीचा हंगाम हा तीन चार महिन्यांचा, त्यात अंडी घालण्याची वेळ अंधारी रात्र, मग कासवे अंडी घालायला किनाऱ्यावर आली आहेत हे कसे समजते? त्यात पुन्हा तुंम्हाला विजेरीचाही वापर करता येत नाही कारण तुम्ही सांगितले तसे त्या प्रकाशामुळे कासवे अंडी न घालता समुद्रात परत निघून जातात’. 

प्रकाश म्हणाला, “तसा आम्हाला साधारण अंदाज येतो. तिथीवरून काळोख्या रात्री कधी आहेत ते कळते.

आणि आम्हाला मदत होते ती टिटव्यांची. किनाऱ्याच्या परिसरात टिटव्या आहेत. कुठलाही परदेशी प्राणी तिच्या नजरेस पडला की टिटवी जोरजोरात ओरडायला लागते. आणि ती न थांबता ओरडत राहाते. तिचे ओरडणे ऐकू आले की आम्ही किनाऱ्यावर पोहोचतो. अजून एक गंमत म्हणजे टिटवीचे ओरडणे ऐकले की कोल्हेही येतात इथे. त्यांना पण कासवे आल्याची चाहूल लागते. कोल्हे कासवांच्या मागावर असतात. त्यांच्या मागे मागे जात घरटी उरकतात आणि आत पुरलेली अंडी खातात. ”

…………………..

वाघ बिबट्यांच्या हालचाली वानर, हरणे, मोर यांच्या ओरडण्याने, ‘कॅाल’ म्हणतात ते, कळतात, हे माहिती होते. कॅाल ऐकू येताच जंगल सफारीतले मार्गदर्शक व पर्यटक तिकडे जमा होतात, वाघ पहायला. परंतू टिटवीपण कासवांच्या किनाऱ्यावर झालेल्या आगमनाचा कॅाल देते हे माहिती नव्हते. मस्त वाटले ते ऐकून.

म्हणजे टिटवीची टिवटिवही अगदीच निरर्थक नसते तर!

 

लेखिका : श्री अनंत गद्रे

प्रस्तुती : जुईली केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सुग्रीवाचा नकाशा… भाग – २ – लेखिका : सुश्री लीना दामले (खगोलीना) ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ सुग्रीवाचा नकाशा… भाग – २ – लेखिका : सुश्री लीना दामले (खगोलीना) ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

(श्री. निलेश नीलकंठ ओक यांच्या भाषणावर आधारित.)

आता आपण दक्षिण अमेरिकेत जाऊ या. Paleontology, Archaeology and Astronomy या सगळ्यांचा मिळून उत्तम असा पुरावा मिळतो.  सुग्रीव सांगतो आहे की क्षीरसागर ओलांडून गेलात की तिथे तुम्हाला मंदेहा नावाचे नाना प्रकारचे डोंगरावरून खाली उलटे टांगलेले असे भयावह राक्षस दिसतील. उलटे टांगलेले म्हटल्याक्षणी आपल्या डोळ्यासमोर येतात ती वटवाघुळे. आता कोरोनाच्या संदर्भात तर आपल्याला माहितीय की या वटवाघूळांच्या मुळेच बॅक्टेरिया पसरले. आपल्या प्राचीन ग्रँथात या विषाणू जिवाणूंनाच राक्षस म्हणून संबोधले गेले आहे. उदा. आपल्या शतपथ ब्राह्मणात असे वर्णन आले आहे की आपल्या मृगाजीनावर बसण्यापूर्वी ते नीट झटकून साफ करून घ्या म्हणजे त्यातले सगळे राक्षस निघून जातील. वटवाघळे खरे तर जगभर पहायला मिळतात, मग इथल्याच वटवाघूळांच्या मध्ये काय विशेष आहे? तर इतर ठिकाणची वटवाघळे frugivorous असतात, बहुतेक करून छोटे किडे, फळे इ वर जगतात, पण दक्षिण अमेरिकेतली ही वटवाघळे म्हणजे vampire bats ही प्राण्यांच्या रक्तावर जगतात. मेलेल्या वटवाघूळांची कवटी बघितली तर समजते त्यांचे दात, सुळे  आणि जबडे किती तीक्ष्ण असतात ते. त्यामुळे त्यांच्या पासून जपून रहायला सुग्रीव सांगतो आहे.

आता कोणी म्हणेल की एवढाच एक पुरावा आहे का तुमच्याकडे तर नाही. तिथे एक विलक्षण जबरदस्त असा पुरातत्वीय पुरावा आहे. तो पुरावा  म्हणजे तिथल्या डोंगरावर असलेली त्रिशूळाच्या आकाराची आकृती. श्री. चमनलाल आणि पुण्याच्या डॉ. प. वि. वर्तकांनीही याबद्दल लिहिले आहे. जेव्हा स्पॅनिश लोक तिथे आले तेव्हा त्यांनी तिथल्या स्थानिक रहिवाश्यांना विचारले की हे तुम्ही तयार केले आहे का तर त्यांनी सांगितले आम्ही नाही आणि आमच्या पूर्वजांनी पण नाही हे केलेले. त्यामुळे तिथल्या रहिवाश्यांना सुद्धा माहीत नाही की हे कोणी केले आणि का केले आहे ते. मात्र या सगळ्या प्रश्नांची उत्तरे वाल्मिकी रामायणात मिळतात. आताच्या काळात त्याला Candelabra of Andes असे म्हणतात. तिथल्या डोंगरावर  ६०० ते ८०० फूट उंच त्रिशूळाची आकृती आहे. त्यात खणलेले चर २ ते ३ फूट खोल आहेत. समुद्रावरून १२ मैल दूरपर्यंत ते दिसू शकतात. डॉ. वर्तकांच्या पुस्तकात तर असेही लिहिले आहे की या आकृत्या फक्त आकाशमार्गाने जाणाऱ्यांना म्हणजे विमानातून जाणाऱ्यांनाच दिसू शकतात. सुग्रीव सांगतोय..

त्रिशिरा: कांचन: केतूस्तालस्तस्य महात्मन:

स्थापित: पर्वतस्याग्रे विराजति सवेदिक:

(त्रिशूळाच्या आकाराचा सुवर्ण ध्वज तिथे पर्वताच्या शिखरावर चमकताना दिसेल. त्याच्या पायाशी वेदिका पण दिसेल.)

त्या नंतर सुग्रीव हे कोणी केले त्याबद्दल सांगतो आहे.

पूर्वस्यां दिशी निर्माणं कृतं तत्  त्रिदशेश्वरै:

तत: परं हेममय श्रीमानुदयपर्वत:

(या आकृत्या उदय पर्वतावर इंद्राने पूर्व दिशा दर्शविण्यासाठी बनवल्या आहेत. पूर्व दिशेचा देव म्हणून सुद्धा इंद्र मानला जातो. इथे कृतं चे दोन अर्थ निघू शकतात. एक तर केले अशा अर्थी. दुसरं म्हणजे रामायण जर त्रेता युगात घडले असे धरले तर त्याच्याही आधी कृत युगात इंद्राने हे तयार केले असे म्हणावे लागेल.)

आता दक्षिण दिशा-

सुग्रीव आता दक्षिणेला जाणाऱ्या गटाला सूचना देतोय. दक्षिणेला जाणाऱ्या गटात त्याने तीन महत्वाच्या लोकांना घेतले आहे कारण सीतेला घेऊन रावण दक्षिणेला गेला हे त्यांना समजले होते. सीतेचे अलंकारही त्यांनी ओळखले होते. त्यामुळे ही दिशा महत्वाची होती. त्या तीन महत्वाच्या व्यक्ती म्हणजे अंगद, जांबवान आणि हनुमान. 

सुग्रीव वर्णन करायला सुरुवात करतो ते पार नर्मदा नदी पासून. नर्मदा, गोदावरी, कृष्णा, वेण्णा इ. नद्या आणि त्यांच्या भोवतीच्या प्रदेशाचे वर्णन तो करतोय. नंतर येते कावेरी. त्यानंतर मलय पर्वतावर तुम्ही जाल तेव्हा तिथून तुम्हाला अगस्त्य तारा दिसेल ,तो तारा जो आदित्या एवढा तेजस्वी आहे. याच्या उत्तरेला इतर कुठल्याही ठिकाणाहून हा तारा दिसणार नाही. ताम्रपर्णी नदीच्या जवळ हा भाग आहे. अगस्त्य तिथे कसा दिसेल तर जणू त्याचा एक पाय महासागरात आणि एक त्या पर्वतावर. नकाशात जिथे आडवी रेषा दिसते तिथपर्यंतच रामायण काळात अगस्त्य तारा दिसत होता. (आता पार दिल्ली पर्यंत दिसतो.) 

दक्षिण दिशेकडे जात जात तुम्ही शेवटी कुठे जाणार आहात तर तो प्रदेश आहे यमाची राजधानी आताचे अंटार्क्टिका. पितृ लोक आहे देवांचा लोक नाही. अतिशय अवघड अशी ती जागा आहे. तिथे जाणेही अवघड आणि गेलात तर परत येणे अवघड. आपल्याला आताही माहिती आहे की अंटार्क्टिकाला भेट देणे किती अवघड आहे ते. तर सुग्रीव सांगतोय असा असा प्रदेश तिथे आहे पण तुम्ही तिथे जाऊ नका.

पाश्चात्य समजुती प्रमाणे अंटार्क्टिका चा शोध इ स 1773 च्या आसपास लागला. पण इथे 14000 वर्षांच्या पूर्वी सुग्रीव त्याच भागाचे वर्णन करतो आहे. काही अतिशय जुन्या इटालियन navigators कडच्या नकाशाच्या मध्ये अंटार्क्टिका खंड दाखवला आहे आणि एवढेच नाही तर त्यावर नद्या दिसत आहेत. आताचा अंटार्क्टिका खंड पूर्णपणे बर्फ़ाने झाकलेला आहे. एक काळ असाही होता जेव्हा अंटार्क्टिकावर बर्फ नव्हते. तेव्हा तिथे नद्या होत्या. 

चार्ल्स हॅपगुड यांच्या पुस्तकात असा नकाशा दाखवला आहे जो मृगाजीनावर चितारला आहे. त्याला ‘पिरी रीस मॅप’ असे म्हणतात. त्यात actually अंटार्क्टिका खंड दक्षिण अमेरिकेशी जमिनीने जोडलेला आहे. (16 th century मॅप) ऑटोमन साम्राज्यातील Turkish admirer या नकाशा बद्दल सांगतोय की त्याने हा नकाशा हिंद चा अरेबिक नकाशा,पोर्तुगीज, सिंध, हिंद आणि चीन इथल्या नकाशांवरून बनवला आहे. इथे हिंद हा शब्द येतोय.

१६ व्या शतकातला नकाशा, सुग्रीवाचा नकाशा यांच्या तुलनेत १९ व्या शतकातल्या युरोपियन लोकांच्या नकाशात अंटार्क्टिका चा भाग रिकामा दाखवला आहे.  याचाच अर्थ पिरी रीस नकाशाचा मूळ स्रोत खूप प्राचीन असला पाहिजे. ज्या अंटार्क्टिका खंडा बद्दल पाश्चात्यांना १८,१९ व्या शतका पर्यंत खात्रीलायक माहिती नव्हती त्याची सविस्तर माहिती सुग्रीव १४००० वर्षांच्या पूर्वी देतोय. भारतीयांनो आपल्याला अत्यन्त अभिमानास्पद अशी ही गोष्ट आहे, नाही का?

– समाप्त – 

लेखिका : सुश्री लीना दामले (खगोलीना)

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सुग्रीवाचा नकाशा… भाग – १ – लेखिका : सुश्री लीना दामले (खगोलीना) ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ सुग्रीवाचा नकाशा… भाग – १ – लेखिका : सुश्री लीना दामले (खगोलीना) ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

(श्री. निलेश नीलकंठ ओक यांच्या भाषणावर आधारित.)

 आपण बघितले की रामायणाचा काळ आहे 14000 वर्षांपूर्वीचा. आणि खगोलशास्त्रीय उल्लेखांच्या आधारावर श्री.नीलेश ओक यांनी ते सिद्ध केले आहे. आताच्या काळातील भौगोलिक वैशिष्ट्ये, जमीन, नद्या, समुद्र जसे आहेत तसेच ते 14000 वर्षांपूर्वी नव्हते. 

वाल्मिकी रामायणात आलेले भौगोलिक वर्णन आताच्या काळातील पुरातत्व शास्त्र, जीवाष्म शास्त्र, समुद्रशास्त्र, हवामानशास्त्र, मानववंशशास्त्र, भूगर्भशास्त्र, भूगोल, अनुवंशशास्त्र, खगोलशास्त्र आणि प्राचीन भारतीय आणि भारता बाहेरील काही निवेदने, वृत्तांताच्या आधारे मिळालेले पुरावे यांच्याशी अतिशय सुंदर तऱ्हेने जुळतात. 

सीतेच्या शोधा साठी जेव्हा वानरसेना निघाली तेव्हा सुग्रीव त्यांना कोणी कुठे कसे जायचे ते समजावून सांगतो आहे. सुग्रीवाने त्या वानरसेनेचे चार भाग पाडून त्यांना चार दिशांना जायच्या सूचना दिल्या आहेत. 

दक्षिण दिशेकडे जाणाऱ्या वानरसेनेच्या गटाला सुग्रीव सांगतोय की तुम्ही जेव्हा या भूभागाच्या (म्हणजे भारताच्या) आग्नेय दिशेला तुम्ही महेंद्र पर्वतावर याल तेव्हा तिथून तुम्हाला अगस्त्य हा तेजस्वी तारा दिसेल तो फक्त तिथूनच तुम्हाला दिसू शकेल आणि तो सुर्या इतका तेजस्वी दिसेल. आता यात वैशिष्ट्य हे आहे की अगस्त्य फक्त तिथूनच का दिसेल असे म्हटले आहे तर त्या काळात तो फक्त भारताच्या अगदी दक्षिण टोकावरूनच दिसू शकत होता इतरत्र कुठूनही नाही. आता अगस्त्य हा तारा अगदी नवी दिल्ली येथूनही दिसतो. यावरून सुद्धा तो काळ 14000 वर्षांपूर्वीचा होता हे समजते. परत कारण तेच, पृथ्वीची परांचन गती.

पावसाळा उलटून गेल्यावर सुग्रीवाने आता सगळ्या वानरसेनेला एकत्र केले आहे. राम लक्ष्मण आणि सुग्रीव एके ठिकाणी बसले आहेत. सुग्रीव पहिल्यांदा पूर्व दिशेला अँडीज पर्वता पर्यंत वाटेत काय काय दिसेल ते सांगतो आहे. दक्षिण दिशेला भारतापासून अंटार्क्टिका पर्यंत काय काय दिसेल ते सांगतो आहे. याचा अर्थ असा नाही की वानरसेना अँडीज पर्वता पर्यंत किंवा अंटार्क्टिका पर्यंत जाऊ शकणार होती किंवा गेली होती. सुग्रीव फक्त सांगतोय. उलट सुग्रीव या ठिकाणी स्वच्छ सांगतो आहे की अंटार्क्टिका पर्यंत जाऊ नका. पश्चिमेला भारतापासून आल्प्स पर्यंत तो काय काय दिसेल ते सांगतो आहे. 

आपण आधी पूर्व दिशे पासून सुरुवात करू. सुग्रीवाने चार दिशांना जाणारे चार गट केले. प्रत्येक गटाचा एक नेता ठरवला. पूर्व दिशेला जाणाऱ्या गटाचा नेता होता विनता. त्यासाठी आपल्याला आधी थोडी अनुवंशिकता आणि पुरातत्व शास्त्र यांच्या अनुषंगाने विचार करावा लागेल. नव्या जेनेटिक संशोधनातून हे समजते की दक्षिण भारतापासून ते ऑस्ट्रेलिया ते दक्षिण अमेरीके पर्यंत एक जेनेटिक सिग्नल नजरेस पडतो. South East Asia, पापुआ न्यूगिनी, अंदमान निकोबार इ देशांचा यात समावेश आहे. यातून तो जेनेटिक ट्रेल जातो असे संशोधन आहे. पुरातत्वीय पुरावे हे सांगतात की माणसाचे अस्तिव दक्षिण अमेरिकेतील चिले येथे 33,000 BCE पासून आहे तर पनामा येथे 50,000 BCE पासून आहे. त्यामुळे सुग्रीवाने 12209 BCE च्या काळातील भौगोलिक वर्णन केले तर त्यात नवल वाटायला नको.

आता सागरीशास्त्राच्या दृष्टिकोनातून 14,000 BCE च्या वेळी पृथ्वीचा नकाशा कसा असू शकेल ते बघू. त्या वेळी आशिया खंड उत्तर अमेरिकेशी सरळ सरळ जमिनीने जोडलेला होता. तसेच भारतही इंडोनेशिया, लाओस, थायलंड अगदी ऑस्ट्रेलिया पर्यंत भागांशी सरळ जमिनीने म्हणजे land mass ने जोडलेला होता. आणि हे का तर त्यावेळी समुद्रसपाटी आताच्या काळा पेक्षा 120 ते 140 मीटर्स खाली होती म्हणून बरीचशी जमीन उघडी पडली होती.

आता सुग्रीव सांगतोय की तुम्ही त्या दिशेला जाल तेव्हा तुम्हाला खूप वेगवेगळ्या तऱ्हेची माणसे दिसतील. ज्यांच्या कानाची पाळी खांद्यापर्यंत लोम्बलेली असेल, त्यांचे ओठ लांबत जाऊन छाती पर्यंत ओघळले असतील. काही लोक कच्चे अन्न, कच्चे मासे खाताना दिसतील. ( इथे सुशी ची आठवण आल्या खेरीज रहात नाही). आता सुद्धा लाओस मध्ये पौडांग स्त्री, इंडोनेशिया मधील कानाची पाळी खांद्या पर्यंत ओघळलेली अशी स्त्री, खूप लांब जीभ असल्याचे डेकोरेशन केलेला द. अमेरिकेतला माणूस किंवा लांब कृत्रिम हनुवटी असलेली माणसे आजही दिसतात. South East Asia ते पापुआ न्यु गिनी येथे अशी चित्र विचित्र केश वेष भूषा केलेली वेगवेगळ्या टोळ्यांची माणसे आजही बघायला मिळतात. आफ्रिकेतही तऱ्हेतऱ्हेची माणसे ज्यांचे ओठ, कान अनैसर्गिक पणे ओघळलेले दिसतात. लांब कशाला अगदी आपल्या देशात दक्षिणेतील  सुपर माची नावाच्या एका  तेलगू सिनेमातील वयस्कर नटीच्या कानाची भोके अशीच खांद्यापर्यंत ओघळलेली आजही बघायला मिळतात. अगदी तस्सेच चित्रविचित्र माणसांचे वर्णन रामायणात सुग्रीवाच्या तोंडून वदवले आहे.

आता सुग्रीव ७ वेगवेगळ्या द्विपांची वर्णने करतो आहे. सुवर्ण द्वीप, रजत द्वीप, यवद्वीप  म्हणजे ओट्स इ.  त्या त्या बेटावर सोन्या चांदीच्या खाणी होत्या. यवद्वीपावर मोठ्या प्रमाणात यवाची शेती होत होती.  त्या काळात भारत खूप तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ बाहेरच्या देशांना देऊन तिकडून सोने, चांदी आयात करत होता. आणि ज्या ज्या बेटावरून सोने चांदी येत होती त्या त्या बेटांच्या नावाने ते सुवर्ण किंवा चांदी ओळखली जाते होती. जसे की जामबुनद सुवर्ण, सुवर्णद्वीप सुवर्ण, पारुजम, परू येथे मिळणारे सुवर्ण इ.

या सात बेटांच्या मधील वेगवेगळ्या (प्रॉव्हिन्सस) प्रांतांच्या चिन्हाच्या (एमब्लेम) मध्ये अशी नावे येतात. उदाहरणार्थ इंडोनेशियाच्या एका प्रॉव्हिन्स च्या चिन्हावर ‘ जय राया’ असे लिहिले आहे. कलीमंथन उत्तरा, बाली द्वीप जया, जावा बेटांच्या चिन्हावर ‘शक्ती भक्ती प्रजा’ असे लिहिलेले आहे. पापा इंडोनेशियाच्या एका चिन्हावर ‘ कार्य स्वाध्याय’ असे लिहिलेले आहे. बिननेक तुंगल इक म्हणजे  चक्क Unity in  diversity असे इंडोनेशियाच्या गरुडाच्या चित्राखाली लिहिलेले आहे. त्यानंतर पुढे त्या वेळच्या ज्वालामुखीचे, तलावांचे वर्णन त्यात येते.

आता आपण प्रशांत महासागर (क्षीरसागर) ओलांडून जाऊया. पॉलीनेशियातील भाषांचा संस्कृतीशी कसा संबंध येऊ शकतो याचा अभ्यास Uschi Ringleb नावाची एक कॅनेडियन संशोधक करते आहे. पॉलीनेशियातील एक नृत्यप्रकार आहे उला डान्स म्हणजे ‘सीवा’ डान्स. त्यांच्या भाषेत सीवाचा अर्थ नाच. इथे सीवा म्हणजे नृत्य करणारा आपला नटराज आठवल्या खेरीज रहात नाहीच. पॉलीनेशियाच्या काही भागात s चा h होतो आणि त्यामुळे सीवा चा हिवा. त्यामुळे तो नृत्यप्रकार हिवा डान्स म्हणून पण प्रसिद्ध आहे.

– क्रमशः भाग पहिला 

लेखिका : सुश्री लीना दामले (खगोलीना)

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ न वाचलं गेलेलं पत्र ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

न वाचलं गेलेलं पत्र ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

मेजर राजेश सिंग अधिकारी, महावीर चक्र (मरणोपरांत) 

भारत-पाकिस्तान कारगिल युद्ध. ३० मे,१९९९. 

दहाच महिन्यांपूर्वी त्याची अशीच वरात निघाली होती आणि तिच्या दारी आली होती. घोड्यावर बसलेला तो राजबिंडा…रूबाबदार! लष्करात अधिकारी असलेला तो होताच तसा देखणा. आठ वर्षांच्या सेवेत लष्कराने शिस्तीच्या संस्कारात एका कोवळ्या तरूणाचे मजबूत शरीरयष्टीच्या,अदम्य आत्मविश्वास असलेल्या, भेदक नजर असलेल्या एका जवानात रुपांतर केले होते… सैन्याधिकारी… राजेश सिंग धर्माधिकारी! इतक्या वर्षांत त्याने मेजर पदापर्यंत मजल मारली होती…आणि  आता तो बनला होता दीडशे ते दोनशे सैनिकांचे नेतृत्व करणारा लढवय्या. १९९९ वर्ष निम्मे सरत आलेले होते. कारगिल परिसरातून आता मेजर साहेबांची बदली होण्याचे दिवस जवळ आले होते. पण….कारगिलच्या शिखरांवरून अप्रिय बातम्यांचा वारा खाली घोंघावू लागला. 

सुरुवातीला वाटले होते की पाकिस्तानातून भारतात कश्मिरविरोधात भारतीय सैन्याला उपद्र्व देण्यासाठी घुसलेले अतिरेकी असावेत आणि तेही नेहमीप्रमाणे अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच. पण धर्माधिकारी साहेबांनी त्या पर्वतशिखरांवरून आपले हेलिकॉप्टर उडवत नेले आणि टेहळणी केली तर परिस्थिती गंभीर होती. घुसखोरांची संख्या अपेक्षेपेक्षा कित्येकपटींनी जास्त होती. शिवाय त्यांनी शिखरांच्या मोक्याच्या ठिकाणी पक्के आणि सुरक्षित बंकर्स खोदून ठेवलेत…त्यातून त्यांना खाली नेम धरणे सोपे होते. आणि अतिशय कडाक्याच्या थंडीपासून बचावासाठी त्यांनी अगदी जय्यत तयारी केलेली होती. गरम कपडे,बूट,हवाबंद पौष्टिक अन्नपदार्थ,संपर्क साधने आणि इतक्या उंचीवर आणून ठेवलेला पुरेसा दारूगोळा! 

मेजरसाहेब तळावर परतले ते चेह-यावर काळजीचा रंग घेऊनच. शत्रू आपल्या अत्यंत जवळ आला आहे. त्यांनी सहका-यांना सावध केलं. तोवर कारगिलच्या इतरही शिखरांबाबत हीच परिस्थिती असल्याचं स्पष्ट झालं होतं. कॅप्टन सौरभ कालिया साहेबांचं गस्तीपथक परतलेलं नव्हतं..त्यांना शोधायला गेलेल्या पथकावरही तुफान हल्ला होऊन पथक नेस्तनाबूत झालं होतं. मेजर धर्माधिकारी यांच्या समोर तोलोलिंग नावाचं भारताचं पर्वतशिखर आता शत्रूच्या ताब्यात होतं. आणि हे शिखर पुन्हा हस्तगत करायचं म्हणजे प्रत्यक्ष मरणाला सामोरं जाणं. कारण परिस्थिती शत्रूला शंभर टक्के अनुकूल होती…पण तोलोलिंग परत घेतलं तरच इतर शिखरं पादाक्रांत करता येणार होती. 

योग्य वेळ पाहून शिखरावर चढाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण पहिला प्रयत्न अर्धवट सोडून द्यावा लागला…कारण दाट धुकं,वरून शत्रूचा तुफान आणि अचूक गोळीबार. त्यात शत्रूच्या स्नायपरने आपल्या एका ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर यांना अचूक टिपून धारातीर्थी पाडलं होतं. त्यादिवशी अधिक चढाई करणं अशक्य झाल्यानं खट्टू होऊन माघारी फिरणं भाग पडलं. 

त्यादिवशी पलटणीत सैनिकांच्या कुटुंबियांची पत्रं पोहोचली. जशी चातकाला पावसाच्या पहिल्या थेंबांची प्रतिक्षा तशी जवानांना आपल्या आप्तांची ख्यालीखुशाली समजण्याची उत्कंठा. मेजर धर्माधिकारी तर नवविवाहीत. आणि राजेश आणि किरण…त्यांच्या संसाराच्या वेलीवर उमलू पाहणा-या एका फुलाच्या प्रतीक्षेत आणि स्वप्नात मग्न असलेलं दांपत्य! पण सीमेवर जमा झालेले युद्धाचे ढग आता किरण यांच्या घरापासूनही स्पष्ट दिसत होते. काळजाला लागलेल्या घोर काळजीचे प्रतिबिंब प्रत्येक शब्दात अगदी आरशासारखे स्वच्छ दिसत होते. पण…मेजरसाहेब तर आता मोहिमेवर निघालेले होते. त्यांना सोळा हजार फुट उंचीवर त्यांच्या पत्नीचे पत्र मिळाले! एका हातात पत्नीचे पत्र, एका हातात तोलोलिंगचा नकाशा आणि खांद्यावर रायफल. डोळ्यांनी पहावे तरी काय आणि वाचावे तरी काय? मेजरसाहेब सहका-यांना म्हणत होते… नकाशा वाचला पाहिजे…तेथून परतल्यावर निवांतपणे वाचता येईल की बायकोचं पत्र! असून असून असणार काय पत्रात? काळजी वाटते, काळजी घ्या…वाट पाहतो आहोत…आम्ही…म्हणजे मी आणि आपलं बाळ!  

तोलोलिंगवर चढाई करता येईलच पण जिवंत परतण्याची शक्यता शून्य! लष्करात जिंदगी घालवलेल्या सर्वांना हे दिसत होतं…आणि त्यात हा गडी म्हणतोय…मोहिमेवरून आल्यावर निवांत वाचेन की पत्र! इतर जवानांना मोहिमेवर निघताना आपल्या कुटुंबियांशी बोलता यावं म्हणून अधिका-यांनी खास सॅटेलाईट फोनची व्यवस्था केली होती. मेजर राजेश साहेबांनी आपल्या साथीदारांना आधी बोलू दिलं…साहेबांचा नंबर लागला आणि त्या सॅटेलाईट फोनची बॅटरी संपली…बोलणं झालंच नाही…शेवटपर्यंत. 

मागच्याच आठवड्यात मेजरसाहेबांनी आपल्या अर्धागिंणीला पत्र धाडलं होतं. “मला लढाईला पाठवलं जातंय…आणि मलाही जायचंच आहे खरं तर. सैनिकासाठी लढाई म्हणजे एक तीर्थयात्रा…दोन्ही लोकी आशीर्वाद देणारी. मी परत येण्याची शक्यता धूसर आहे. नाहीच आलो तर आपल्या होणा-या बाळाला कारगिलच्या या शिखरांवर नक्कीच घेऊन ये. दाखव त्याला..त्याचा बाप कुठे लढला ते! देशाचा संसार सावरला तरच मी आपला संसार भोगू शकेन. या पत्राच्या उत्तरात तू काय लिहिणार आहेस हे मला आधीच ठाऊक आहे….!” 

याच पत्राचं उत्तर आलं असावं…आणि त्यात बाईसाहेबांनी काय लिहिलं असावं याची उत्सुकता मेजरसाहेबांना असण स्वाभाविक होतं. पण कर्तव्यापुढे वैय्यक्तिक आयुष्य कवडीमोलाचं असतं सैनिकांसाठी! संसार तर होत राहील….देशाचा संसार राखणं गरजेचं होतं. मेजरसाहेबांनी ते पत्र न उघडताच आपल्या ह्र्दयावरील खिशात अलगद ठेवून दिलं आणि प्लाटून…लेट्स मार्च अहेड! असं खड्या आवाजात म्हणत ते आपल्या सहकारी सैनिकांच्या चार पावलं पुढेच निघाले….नेत्याने अग्रभागी राहायचं असतं…शत्रूला भिडायचं असतं. नव्वद अंशाचा,चढण्यास अशक्य असलेला कोन,पहाटेचा अंधार,जीवघेणी थंडी,वरून होणारा गोळीबार. खरं तर शत्रू इतका आरामशीर बसला होता की त्यांना गोळ्याही झाडण्याची गरज पडली नसती…केवळ एखादा दगड जरी वरून भिरकावला असता खाली तरी वरती चढण्याच्या प्रयत्नात असलेला भारतीय जवान खोल दरीत कोसळून गतप्राण होईल…आणि तसं होतही होतं. 

मेजरसाहेबांना आता थांबायचं नव्हतं. त्यांनी आपल्या तुकड्यांना तोलोलिंगला तिन्ही बाजूने वेढण्याचे आदेश दिले. आणि मधल्या तुकडीच्या अगदी पुढे निघाले सुद्धा…त्यांच्या दिशेने अर्थातच तुफान गोळीबार सुरु झाला….दुश्मनांकडे अत्याधुनिक शस्त्रं होती आग ओकणारी. मेजरसाहेब तशाही स्थितीत मोठमोठे दगद शिताफीने ओलांडत आणि त्याचवेळी आपल्या गनमधून वर फैरी झाडत इंचाइंच करीत वर जात होते. शत्रू लपून बसलेल्या पहिल्या बंकरपर्यंत पोहोचताच त्यांची आणि शत्रूच्या दोन जवानांची समोरासमोर गाठ पडली…मेजरसाहेबांनी त्या दोघांशी हातघाईची लढाई लढली. शत्रू काही अर्धप्रशिक्षित घुसखोर अतिरेकी नव्हता…पाकिस्तानी लष्कराचा नियमित सैनिक होता. पण भारतीय लष्कराचे प्रशिक्षण वरचढ ठरले….आणि भारतीय जवानांचे मनोधैर्यही! मेजरसाहेबांनी दोघांचाही खात्मा केला…हे सगळं करत असताना त्यांच्या देहात गोळ्या घुसलेल्या होत्या. हे सगळं त्यांचा एक सहकारी काही अंतरावरून पहात होता…तेव्हढ्यात त्याच्या संपर्क साधनावर वरीष्ठ अधिका-याने संपर्क साधला….सहकारी म्हणाला…अधिकारी साहब…जांबाजीसे लड रहे है….” तितक्यात एका गोळीने या सहका-याचा वेध घेतला…संपर्क कायमचा समाप्त झाला. 

इकडे मेजरसाहेबांनी पुढे कूच केले…पहिला बंकर जवळ जवळ ताब्यात आलेला असतानाच त्यांच्यावर अगदी जवळून गोळीबार झाला….आणि देहाचा आणि जीवाचा संबंध संपुष्टात आला! आता आत्मा मुक्त झाला होता स्वर्गात जाण्यास! मेजरसाहेबांचे सोबतीही या प्रवासात त्यांच्याच सोबत होते! यश थोडे मिळालेले असले तरी त्या यशाने पुढच्या यशाचा पाया रचला होता….ही अशक्यप्राय कामगिरी होती….हे खरं तर आपलंच अपयश होतं….शत्रूच्या कावेबाजपणाचा अंदाज यायला तसा खूप उशीर झाला होता आणि हा डाग धुण्यासाठी रक्तच कामी येणार होतं…आणि सुदैवानं या रक्ताची टंचाई नाही आपल्याकडे. 

छातीत घुसलेल्या गोळ्या… त्यातून रक्ताचे प्रवाह शरीरभर ओघळत असताना त्या रक्ताने मेजरसाहेबांच्या खिशातील पत्रालाही अभिषेक घातला….सौ.किरण अधिकारी यांनी जीवाच्या तळापासून लिहिलेले शब्दांनी लालरंग ल्यायला होता….विरहाची पत्रं प्रेमिकांच्या आसवांनी भिजतात …इथं शेवटचा निरोप रुधिराने ओलाचिंब झालेला होता. 

बारा तेरा दिवस मेजरसाहेब आणि सहका-यांचे निष्प्राण देह तोलोलिंगवर शत्रूच्या बंकर्समध्ये निश्चेष्ट पडून होते……युद्धाच्या धुमश्चक्रीत तिथपर्यंत पोहोचणं अशक्य होतं…आणि ते देह परत मिळवण्याचा वज्रनिर्धार करून पुन्हा तोलोलिंगवर चढाई करण्यास आणखी जवान आणि अधिकारी सज्ज होते! लीव न में बहाईंड. कोई साथी पिछे न छुटे! 

मेजरसाहेबांच्या घरी चौदा दिवस काहीही खबर नव्हती….कलेवरंच नव्हती तर हौतात्म्य जाहीर तरी कसं करायचं? कोण जाणो…चमत्कार झालेलाही असावा! पण असे चमत्कार विरळा! 

आज मेजरसाहेब आपल्या स्वत:च्या घरी आले होते…जसे नव्या नवरीला घरी मिरवणुकीने घेऊन आले होते तसे…पण आज दृश्य वेगळे होते. फुलं होती,हार होते…पण ते सरणावर जाणा-या देहावर पांघरण्यासाठी. हजारो लोक होते सोबत…पण त्यांच्या ओठांवर अमर रहेच्या घोषणा आणि डोळ्यांत आसवं. 

ती अगदी स्तब्ध उभी होती त्याच्या. इतरांच्या शोकाच्या गदरोळात तिचं शांत राहणं भयावह होतं. लोकांना आता तिचीच काळजी वाटू लागली…दु:खानं भरलेलं काळीज मोकळं नाही झालं तर काळीज फाटून जातं…अल्फ्रेड लॉर्ड टेनिसनने लिहून ठेवलंय… Home they brought her warrior dead: She nor swoon’d nor utter’d cry:All her maidens, watching, said, “She must weep or she will die.” त्यांनी त्या हुतात्मा योद्ध्याचा,तिच्या पतीचा मृतदेह तिच्या घराच्या अंगणात आणून ठेवला आहे…पण ती थिजून गेलीये…एकही हुंदका फुटत नाहीये….ती रडली नाही तर ती सुद्धा मरून जाईल…(मग तिच्या नवजात बाळाचं काय होईल?) पण इथं कुणी काहीही बोलायची हिंमत करत नव्हतं! ती बराच वेळ तशीच उभी राहिली त्याच्या कलेवराजवळ…आणि तेवढ्यात पार्थिव घेऊन आलेल्या लष्करी अधिका-याने तिच्या हातात मोठ्या अदबीने एक लिफाफा ठेवला…त्या लिफाफ्यावर ठळक अक्षरात नाव होतं…तिच्याच अक्षरात….मेजर राजेश अधिकारी यांस….! लिफाफा फोडला गेलेला नव्हता..आतलं पत्र तसंच होतं…वाचलं न गेलेलं!  

तो आता ते पत्र कधीही त्याच्या डोळ्यांनी वाचू शकणार नव्हता…मात्र त्याचा आत्मा कदाचित पत्रातील मजकूर ऐकायला आतुर झालेला असेल…तिने आसवांच्या शब्दांनी त्याच्या कानात तिने पत्रात लिहिलेला मजकूर ऐकवला असेल…तिने लिहिले होतं….तुम्ही परत आलात तर मी खूप भाग्यवान समजेन स्वत:ला, पण मातृभूमीच्या रक्षणार्थ तुम्ही प्राणांचं बलिदान दिलंत तर एका योद्ध्याची पत्नी म्हणून मी अभिमानाने जगेन. आपलं होणारं बाळ मुलगा असेल की मुलगी मला माहित नाही…पण मी त्या बाळाला तुम्ही लढलात त्या युद्धभूमीवर निश्चित घेऊन येईन…आणि त्याला किंवा तिला तुमच्यासारखंच शूर योद्धा बनवीन….तुम्ही माझे हे उत्तर तुमच्या डोळ्यांनी वाचलं असतं तर तुम्हांला किती आनंद झाला असता ना…राजेश?  तुम्हांला इन दी हेवन हे गाणं म्हणायला आवडायचं ना!  

Beyond the door There’s peace, I’m sure And I know there’ll be no more Tears in heaven…स्वर्गात आसवांना जागा नाही मुळीच….सुखद शांतता असते तिथे….मला माहित आहे…तुम्ही त्या स्वर्गात सुखनैव रहाल! 

(पंचवीस वर्षांपूर्वी कारगिल युद्धाच्या अगदी आरंभीच्या दिवसांत तोलोलिंग नावाचं महत्त्वाचं शिखर पाकिस्तान्यांकडून ताब्यात घेण्यासाठी तेथील पत्थरांना आपल्या जवानांनी अक्षरश: रक्ताचा अभिषेक घातला. यातीलच एक तरूण रक्त होतं मेजर राजेशसिंह अधिकारी यांचं. मुंबईच्या सैनिकप्रेमी भगिनी उमा कुलकर्णी या रोज एका सैनिकाची माहिती पोस्ट करीत असतात. त्यातूनच अधिकारी साहेबांच्या पराक्रमाविषयी वाचायला मिळालं. आणि महावीर चक्र (मरणोत्तर) विजेते मेजर राजेशजी अधिकारीसाहेब आणि त्यांच्या पत्नीचा,कुटुंबियांचा त्याग प्रखरतेने नजरेसमोर आला. त्या पोस्टवर आधारीत हा लेख आहे.) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares