मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ माहिती आहे तुम्हाला? देशातला पहिला “मॉल” शंभर वर्षांपूर्वी लातूरात उभा राहिला…!! – लेखक – अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ माहिती आहे तुम्हाला? देशातला पहिला “मॉल” शंभर वर्षांपूर्वी लातूरात उभा राहिला…!!  – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

मॉल म्हणजे काय? तर मोठी इमारत किंवा कनेक्ट इमारतींची मालिका, ज्यामध्ये विविध वस्तू एकत्र मिळणाऱ्या दुकानांची मालिका… ज्यात हॉटेल्स पण असतील असे ठिकाण… जगात 19 व्या शतकात बांधकामात अनेक प्रयोग झाले.. रचनात्मक शहरे उभी राहिली… भारतात ब्रिटिशांनी त्यांच्या शैलीत अनेक इमारती बांधल्या… पण देशात पहिल्यांदा शहराच्या मध्यभागी भव्य गोलाकार मार्केट उभं करून शहरातले सगळे रस्ते जोडण्याची अभिनव कल्पना सुचली ती लातूरकरांना… सालं होतं 1917..  देशभरात ब्रिटिशांची सत्ता होती. मात्र लातूरवर निजामशाहीची हुकूमत होती, ब्रिटिशांबरोबर तह करून आपलं राज्य चालविणाऱ्या निजामकाळात लातूरमधल्या तत्कालीन व्यापाऱ्यांच्या डोक्यात अशा मार्केटची कल्पना सुचली की, सगळ्या गोष्टी लोकांना एकत्र मिळाव्यात. मग त्याची रचना पक्की झाली… मध्यभागी देवीची प्रतिष्ठापना.. त्यामागे आपल्या पाठीशी आदीशक्तीचे पाठबळ आहे ही धारणा प्रत्येकाच्या मनात असावी…  8 जून 1917 रोजी लातूर मध्ये “गंजगोलाईची स्थापना करण्यात आली.. त्याचे उदघाटन, निजामकाळातील सुभेदारी म्हणजे आयुक्त कार्यालय गुलबर्गास्थित होतं, त्याचे सुभेदार होते राजा इंद्रकरण… त्यांच्या हस्ते झाले आणि आजच्या व्याख्येप्रमाणे देशातला पहिला “मॉल” लातूरात उभा राहिला.

‘गंज’ हा उर्दू शब्द आहे, त्याचा अर्थ होतो वस्तूबाजार (आणि मराठवाड्यात, मोठे गोल भांडे असते दूध वगैरे काढण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी त्यालाही गंज म्हणतात) अशी गोल, वस्तूबाजार असलेली बाजारपेठ उभी राहिली..  त्याला 16 रस्त्यांनी जोडण्यात आले… या सोळा रस्त्यांवर ठोक व्यापारी दुकाने वसविली गेली.. एक रस्ता फक्त सोनारासाठी म्हणजे सराफ लाईन, दुसरा रस्ता फक्त कापड दुकान – ती कापड लाईन, एक लाईन अन्नधान्याची – भुसारलाईन… असे 16 रस्ते – सोळा ठोक व्यापाराच्या लाईन.. असं देशात कुठे आहे का? तर आहे, पण लातूरची गंजगोलाई उभी राहिल्यानंतर दिल्लीत 1921 ला ब्रिटिश अधिकारी एडविन लुटनेस यांनी गोल मार्केट वसविले.. कमी जागेत अधिक दुकाने दळणवळणासाठी सोयीस्कर ठरतात म्हणून ही रचना केली… पुढे 1925 मध्ये रायपूरलाही गोल मार्केट ब्रिटिशांनी वसविले.

लातूरची गोलाई एतद्देशीय लोकांनी त्यांच्या कल्पनेतून उभी केली. या स्थानिक व्यापाऱ्यांनी आपल्या जागेची मागणी,  त्याकाळी लातूरची पेशकारी ज्या औशावरून चालायची – तिथले पेशकार  सुजामतअली यांच्या मदतीने हैद्राबाद निजाम दरबारी पोहचवली व जागा उपलब्ध करून घेतली..  पुढे 1945 ला परदेशावरून आलेल्या फय्याजुद्दीन या वास्तूरचनाकाराच्या मदतीने कच्ची गोलाई पक्की झाली…!!

1905 ला लातूरला तहसील दर्जा मिळाला. त्यापूर्वी नळदुर्ग हे तहसील कचेरीचे ठिकाण होते. 1923 ला मिरज लातूर रेल्वे सुरु झाली आणि लातूरची वाढ व्यापारी केंद्र म्हणून झाली… या व्यापारी पेठेची ख्याती देशभर पसरली. त्यातून गंजगोलाई आणि तिचे वैशिष्ट्य देशभर पसरले… गंजगोलाई हे लातूरच्या इतिहासातील सोनेरी पान आहे… आणि लातूरकरांच्या मनामनात या गंजगोलाईबद्दल अभिमान आहे. ते लातूरकरांच्या अभिमानाचे प्रतीक आहे… अशा या गंजगोलाईचा आज वर्धापन दिन आहे… चला लातूर संस्कृतीचा अभिमान ठेवू या… देशभर तो अधिक तेजाने पसरवू या…!!       

लेखक – अज्ञात

संग्राहक : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डोंगर – झाडे – आणि पाणी ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ डोंगर – झाडे – आणि पाणी ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

डोंगर आणि झाडाशिवाय जमिनीत पुरेसे पाणी साठवणे अशक्य आहे. 

1) डोंगर हे जमिनीतील पाणीसाठ्याचे बाह्य कवच असते. उन्हाळ्यात डोंगराचे बाह्य आवरण तापते. मात्र  भूपृष्ठापर्यंत उष्णता पोहचू न शकल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही. याउलट डोंगर फोडला तर उष्णता थेट पोहचते व डोंगराच्या पोटातील ओलावा संपुष्टात येतो. 

2) पाणी जमिनीत दोन प्रकारे साठवले जाते. एक मृत साठ्याचे पाणी आणि दुसरे जिवंत साठ्याचे पाणी . 

मृत साठ्याचे पाणी हे दहा फुटावर पाझरते तर जिवंत साठ्याचे पाणी दहा ते १०० फूट व त्यापेक्षा अधिक पातळीवर आढळते.

जेेव्हा पाऊस पडतो तेव्हा नदी-नाल्याचे पाणी मृत साठ्याच्या स्वरूपात जमिनीत साठले जाते, जे की एकदा उपसले की संपून जाते. आणि जोपर्यंत ओढे वगळ वहात असतात तोपर्यंतच विहीर व बोअरला पाणी असते. 

तर जिवंत साठ्याचे पाणी आज तरी भूगर्भातून संपलेले आहे. कारण जिवंत पाणी खोलवर जाण्यासाठी नैसर्गिक यंत्रणा हवी असते. 

3) एक पाण्याचा थेंब खडकातून पाझरून भूगर्भात जाण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो. म्हणजेच दहा फुटांवर जाण्यासाठी दहा वर्ष लागतात. 

4)  एक झाड एका दिवसाला दहा लिटर पाणी जमिनीत ५० फुटावर घेऊन जाते. कारण झाड हे जमिनीच्या वर जेवढ्या उंचीपर्यंत असेल तेवढीच खोलवर त्याची मुळे असतात. म्हणून झाडं ही निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन आहे, 

5) एक लिंबाचे झाड एकूण दहा हजार लिटर पाणी पावसाळ्यात जमिनीत घेऊन जाऊ शकते. याचा अर्थ आपल्या परिसरात किमान ३० झाडं लिंब, चिंच ,जांभूळ, आंबा , मोह, अर्जुन या वर्गातील नक्कीच असतील. म्हणून मृत साठ्याचे पाणी पाझरत रहात असावे. 

6) एक वडाचे किंवा पिंपळाचे मोठे झाड एका हंगामासाठी एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते.आणि ते ही पन्नास फुटाच्याही खाली. वडाची व पिंपळाची मुळे पाषाणालाही भेदून ८०० ते १००० फुटावर पोचतात. 

एक कोटी लिटर म्हणजे एका विहीरीचा शंभर वेळा उपसा करावा एवढे पाणी. याचा गणितीय हिशोब सांगायचा झाला तर ३५ एकर शेतीचे रब्बी हंगामाचे भरणपोषण होते, आणि वर्षभर बागायतीसाठी १५ एकरला पुरेल एवढे जिवंत साठ्याचे पाणी एक वड किंवा पिंपळ पुरवतो. 

म्हणून आपल्या शेताच्या शेजारी मोकळी पडीक जागा असेल तर किमान एक असा महावृक्ष लावा. 

आपण एका बोअरवेलसाठी एक लाख रु.खर्च करतो. एका विहीरीसाठी पाच लाख रु. खर्च करतो. पण पाणी लागण्याची  कुठलीच शाश्वती नसते. 

— कारण आपली नियत ही धूर्त असते. डोंगर संपुष्टात आणण्याची, डोंगरावरील झाडं तोडण्याची, बांध संपवून बोडके करण्याची नियत असते. म्हणून मग पाणी येणार तरी कुठून? 

6) पाण्याचे दुर्भिक्ष हे मानवनिर्मित आहे. देवाला दोष देण्यात अर्थ नाही. खरे दोषी आपण व आपला स्वार्थ आहे. 

हवा ही ऊर्जा आहे.

पाणी हे अमृत आहे

तर माती ही जननी आहे.

तर झाडं हे जीवनदायी आहेत. —

झाड नसेल तर हवा रोगट होते. पाणी विषासमान होते आणि माती वांझ होवून शापीत होते.

7) झाडांचं मूल्य समजून घ्या… आणि दहा रूपयाचं फक्त एक झाडं शेत असेल तर शेतात, नाही तर माळरानावर, डोंगरावर कुठेही जगविण्याची जबाबदारी घ्या…. 

या शिवाय दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नाही. तुम्ही गावाचे, शहराचे, देशाचे, समाजाचे आणि स्वहिताचे जर काही देणं लागत असाल तर एवढचं साधं काम करा. 

झाडं माणसाचे मन, मस्तिष्क व जीवन हिरवंगार करत असतात. 

8) एक सदैव लक्षात असू द्या. झाडांची पाणी साठवण्याची व वाहण्याची क्षमता त्यांच्या  वयावर व प्रकारावर अवलंबून असते. शक्यतो देशी झाडे लावा.

— “झाडे लावा – झाडे जगवा” —

माहिती प्रस्तुती : विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सोन्याची गट्टी फू”… भाग-1 – सुश्री शीतल श्रीधर माडगूळकर ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆

? मनमंजुषेतून ?

☆ “सोन्याची गट्टी फू”… भाग-1 – सुश्री शीतल श्रीधर माडगूळकर ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆

गदिमांचे आपली आई बनुताई यांच्यावर विलक्षण प्रेम होते. आई बनुताई खूप छान ओव्या रचत असत. पपा आपल्या कवितेला आईच्या ओव्यांची दुहिता (लेक) म्हणायचे. ते म्हणत, “आईच्या गीतगंगेतली कळशी घेऊनच मी मराठी शारदेचे पदप्रक्षालन करीत असतो.” आईंना दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक तोंडपाठ होते. त्या सकाळी तुळशीकट्ट्यावर खूप सुंदर रांगोळी रेखाटत असत.

माझा मुलगा आणि त्यांचा पणतू सुमित्र याच्यावर आईंचे विलक्षण प्रेम होते. त्यांच्यातले अर्धे डाळिंब आवर्जून त्याच्यासाठी राखून ठेवलेले असे. त्याच्या जन्मामुळे त्यांना काशीयात्रेचे पुण्य मिळाले अशी त्यांची भावना होती. मला त्या म्हणायच्या, “किती गुणी पोर आहे ग! असे पोर दररोज एक घरात जन्मले तरी चालेल.” मला या त्यांच्या बोलण्याची खूप गंमत वाटायची.

दररोज सकाळच्या कोवळ्या उन्हात त्या पंचवटीच्या मागच्या अंगणात काठी घेऊन फेऱ्या मारत. मग तुळशी कट्ट्यावर बसून आम्हाला पालेभाजी निवडून देत, किंवा ताक घुसळून छान ताजे लोणी काढून देत.

एके दिवशी त्या असच काठी हातात धरून मागच्या अंगणात फेऱ्या मारत होत्या. माझ्या सासूबाई विद्याताई तिथेच व्हरांड्यात चटईवर बसून भाजी चिरून देत होत्या. मी स्वयंपाकघरात सकाळचा नाश्ता बनवत होते.

तो सव्वा वर्षाचा होता त्यावेळी.. आपल्या दोन्ही आज्यांच्या संगतीत सुमित्र आपल्या लाल जीपगाडीत बसून, पायडल न मारता पायांनी ती छोटी जीप चालवत होता.

थोडा वेळ गेला आणि एकदम सुमित्रचे जोरात कळवळणे आणि मोठ्या आवाजात रडणे मला ऐकू आले. मी धावत मागच्या अंगणात गेले….. पपा खोलीत निघून गेले होते.. ताईंनी सुमित्रला जवळ घेतले होते आणि त्या त्याच्या लाल झालेल्या गोऱ्यापान, गोबऱ्या गालांवर हळुवार फुंकर घालत होत्या…. मला काहीच कळेना… नंतर कळले की आई अंगणात काठी घेऊन फेऱ्या मारत असताना सुमित्र त्याची जीप जोरात चालवत होता आणि अगदी त्यांच्या पायाजवळ नेऊन थांबवत होता… पपांनी त्याला दोनतीनदा सांगितले, “सोन्या, असे करू नकोस.” त्यांचे नेहमी सर्व ऐकणाऱ्या सुमित्रला त्या दिवशी कसला चेव चढला माहिती नाही, त्यांचे न ऐकता तो परत परत तसेच करत राहिला. मग मात्र पपांचा संताप अनावर झाला. अनवधानाने त्यांनी त्याच्या एक जोरात कानशिलात दिली. पपांचे हात जरी गाद्या बसवल्यासारखे मऊ होते तरी मुलांना मारताना मात्र त्यांना खूप लागत.

सुमित्रच्या गोऱ्या, गोबऱ्या गालावर चार बोटे उठली होती…. त्याला जवळ घेऊन मी शांत केले. इतक्या छोट्या नातवाला आपण मारले याचे पपांनाही खूप वाईट वाटले. ते बराच वेळ खोलीत झोपून राहिले. नीट जेवलेही नाहीत.

मी सुमित्रला नंतर समजावून सांगितले की, ‘पपा आजोबांना सांग की मी परत असे करणार नाही.’ त्याला हेही सांगितले की अशी पणजीआजीच्या अंगावर गाडी नेलीस तर चालताना घाबरून तिचा तोल जाऊन ती पडली असती आणि तिला खूप मोठा बाऊ झाला असता. मग मात्र तो घाबरला आणि मला ‘सॉरी’ म्हणाला. पण पपांच्या जवळ जाऊन माफी मागायला काही तयार होईना.

जवळजवळ दिवसभर तो त्यांच्या जवळपासही फिरकला नाही. आडून आडून हळूच पपांकडे बघत होता. संध्याकाळी पपा फिरून आले. आल्या आल्या सुमित्रला जोरात हाक मारली, 

“सोन्याss”, तो सगळं विसरून आपल्या लाडक्या आजोबांकडे पळत पळत गेला. त्याला कडेवर घेऊन त्याच्या अस्पष्ट झालेल्या गालांवरच्या वळाची पापी घेऊन पपांनी त्याला कुरवाळले… आणि त्याच्या आवडीचे एक मोठे जेमच्या गोळ्यांचे पाकीट त्याला दिले…

त्याने आपल्या बोबड्या स्वरात पपांना विचारले, “आता पलत मला नाही ना मालनाल? मी अशे कलनाल नाही पलत.” 

यावर पपा त्याचा पापा घेऊन मोठ्या प्रेमभराने म्हणाले, “नाही ले माझ्या लाज्या…” 

मला त्या दोघांचे प्रेम बघूनच डोळ्यांत अश्रू आले… पपांना कोणीतरी विख्यात ज्योतिषांनी सांगितले होते की, तुम्ही ज्या दिवशी गाडी घ्याल त्या दिवशी तुमच्या आईला गमवाल. खेळण्यातली जीपगाडी पण आपल्या आईला चुकून लागली तर..?  हा विचारही त्यांच्या हळव्या कविमनाला सहन झाला नव्हता…

क्रमशः…

  – सुश्री शीतल श्रीधर माडगूळकर

संग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्वामी विवेकानंदांची महासमाधि ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?इंद्रधनुष्य?

स्वामी विवेकानंदांची महासमाधि ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

४ जुलै १९०२ या दिवशी स्वामीजींनी पार्थिव देहाचा त्याग करून स्वधामी प्रयाण केले.

त्यांनी त्या अखेरच्या दिवशीही शिष्यांना व्याकरण कौमुदी, वेदांत सूत्रे शिकवली होती.

त्यांनी बरेच दिवस अगोदर आपल्या शिष्याला दिनदर्शिका आणायला सांगितली. त्यातील शुभयोगांचा बारकाईने अभ्यास करून त्याच दिनदर्शिकेवरील ४ जुलै या दिवसावर खूण करून ठेवली.

त्यांच्या महाप्रयाणापूर्वी काही दिवस अगोदर त्यांनी आपल्या सर्व शिष्यांसाठी सहभोजन आयोजित केले होते. त्यांनी स्वतः स्वयंपाक करून या लाडक्या शिष्यांना आणि गुरूबंधूंना आग्रह करून जेवायला वाढले होते. सगळ्यांचे भोजन होत आल्यावर स्वामीजी बाहेर जाऊन या सर्वांच्या हातावर पाणी घालण्यासाठी हातात भांडे घेऊन उभे राहिले होते.

मार्गारेट नोबल अर्थात् स्वामीजींची मानसकन्या भगिनी निवेदिता स्वामीजींनी तिच्या हातावर पाणी ओतताना म्हणाली, ” स्वामीजी, येशू ख्रिस्ताच्या जीवनातील अंतिम भोजनाचा जो प्रसंग आहे, तेव्हा स्वतः येशूने आपल्या भक्तांच्या हातावर भोजनानंतर पाणी घातले होते. मला त्याची आठवण आली. “

त्यावर स्वामीजी म्हणाले, ” होय मार्गारेट ,हा अगदी तसाच प्रसंग आहे. “

स्वामीजींनी देह ठेवल्याचे समजताच भगिनी निवेदितेला त्यांच्या या बोलण्याचा अर्थ उमगला, आणि तिच्या आक्रोशाला काही सीमाच राहिली नाही.

स्वामीजींच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेताना तिच्या असे मनात आले, की स्वामीजींची अंतिम आठवण म्हणून त्यावेळी त्यांनी परिधान केलेल्या पवित्र वस्त्राचा एक तुकडा आपल्याला मिळेल का ? तिने तसे विचारल्यावर त्याला नकार मिळाला.

ती शोकाकूल वातावरणात स्वामीजींची आई भुवनेश्वरी देवी आणि सारदा माताजी यांच्या शेजारी बसून मंत्रोच्चारात केल्या जाणाऱ्या अंतिम संस्कारांचे निरीक्षण करीत होती. थोड्याच वेळात भडकलेल्या अग्नीने स्वामीजींचे पार्थिव आपल्या कवेत घेतले.जोराचा वारा आला, आणि त्या अग्निच्या ज्वालांमधून त्या वा-याने उडालेला स्वामीजींच्या काषाय वस्त्राचा एक तुकडा भगिनी निवेदितेसमोर येवून पडला. तिने अनावर झालेल्या अश्रुधारा आवरत तो पवित्र वस्त्राचा तुकडा स्वामीजींची अखेरची आठवण म्हणून उचलला आणि तो मरेपर्यंत प्राणपणाने सांभाळला.ती म्हणते,

“स्वामीजींनी माझ्या प्रत्येक धर्मजिज्ञासेचं समाधान केलं, माझ्यावर पूर्ण कृपा केली, आणि देह ठेवल्यावरही माझी अगदी क्षुल्लक इच्छाही तत्परतेने पूर्ण करीत त्यांच्या देहातीत अस्तित्वाचे प्रमाण दिले.”

मार्गारेट नोबल जन्मभर लिहिलेल्या प्रत्येक पत्राच्या अखेरीस स्वतःचे नाव लिहिताना Sri Ramkrushna Vivekananda’s Bhagini Nivedita असे मोठ्या प्रेमाने लिहित असे.

पुढे रामकृष्ण मठाने स्वामीजींचे समग्र वाङ्मय प्रकाशित केले, त्यावरील अभिप्राय देताना भगिनी निवेदिता लिहिते, 

“या भारतात जेव्हा एखादे निरागस बालक आपल्या आईला विचारेल” आई, हिंदू धर्म म्हणजे काय गं ? त्यावेळी ती अगदी नि:शंकपणे आपल्या अपत्याला सांगेल, की बाळा स्वामीजींचे जीवन म्हणजे मूर्तिमंत हिंदू धर्म आहे. तू स्वामीजींचे समग्र वाङ्मय वाच, तुला हिंदू धर्माचे आकलन होईल.”

आपण सारेच परम भाग्यवान आहोत, की स्वामीजी आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी खूप मोठा वैचारिक वारसा मागे ठेवून गेले आहेत.स्वामीजी भारतीयांना म्हणतात, ” तुम्हाला किमान बाराशे वर्षे पुरेल इतके विचारधन मी तुमच्यासाठी मागे ठेवले आहे. उठा,जागे व्हा, आणि ध्येय प्राप्तीपर्यंत क्षणभरही विसावू नका.”

प्रत्यक्ष ईश्वरी साक्षात्कार होणं हेच जीवनाचे एकमेव ध्येय आहे.

स्वामीजींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना कृतज्ञ प्रणाम. त्यांची दैवी तेजस्विता त्यांच्याच कृपेने आपणा सर्वांच्या जीवनातही प्रकाशित होवो, आणि तेजस्विता येवो, हीच प्रार्थना.

संग्राहक : – सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ इथे ओशाळला शेक्सपिअर… ☆ श्री सुरेश नावडकर ☆

श्री सुरेश नावडकर
? इंद्रधनुष्य ?

☆ इथे ओशाळला शेक्सपिअर…☆ श्री सुरेश नावडकर ☆

शेक्सपिअर म्हणतो, ‘ नावात काय आहे? ‘– तर नावातच खूप काही आहे.. कसं? ते बघाच… जगातील कोणत्याही देशांपेक्षा, आडनावांची विविधता फक्त भारतातच आहे.. त्यातूनही महाराष्ट्रात तर, या बाबतीत आडनावांनी कहरच केलेला आहे…

आडनावांची विविधता ही अनेक प्रकारांमध्ये विभागलेली आहे.

रंगावरुन प्रचलित असलेली आडनावं.. काळे, गोरे, पांढरे, सावळे, भुरे, हिरवे, तांबडे, पिवळे, करडे, जांभळे, तपकीरे, इत्यादी. यामध्ये अनेकदा आडनावाच्या विरुद्ध ती व्यक्ती असते.. उदा. काळे आडनावाच्या बाई, गोऱ्यापान असतात.. तर गोरे आडनावाचे सद्गृहस्थ, कोळशाशीही स्पर्धा करणारे दिसतात..

धातूंची आडनावंही, बरीच आहेत.. जसे तांबे, पितळे, लोखंडे, कासे, चांदेकर, पुणतांबेकर, इत्यादी. काही खनिजांवर आधारित असतात..  रत्नपारखी, हिरे, पोवळे, लसुणे, गारगोटे, इ.

काही आडनावे, चेहऱ्यावरील अवयवांशी जोडलेली असतात.. जसे डोळे, काने, दुतोंडे, केसकर, टकले, माने, दाते, बोबडे, तिरळे, डोळस, अंधे, डोईफोडे, इ. 

आडनावं, व्यवसायावरुनही चालत आलेली आहेत.. जसे सोनार, सराफ, चांदिवले, वकील, सुतार, पारधी, वैद्य, चिटणीस, दिवाण, भगत, गुरव, लोहार, इ. काही पिढ्यांसाठी त्यांचा तो व्यवसाय असेलही, नंतर मात्र सोनाराचं, कापडाचं दुकान असतं किंवा लोहाराचा टेलरींगचा व्यवसाय असतो..

भाजीपाल्यांवरुनची आडनावं फारच गंमतीशीर असतात.. जसे भोपळे, दुधे, कारले, पडवळ, भेंडे, गवारे, रताळे, मुळे, तोंडले, केळकर, आंबेकर, फणसे, गाजरे, ढोबळे, राजगिरे, अंबाडे, नारळे, काकडे, इ. यातील भोपळे हे सडपातळ असू शकतात.. व कार्लेकर, मिठ्ठास बोलणारे असतात..

प्राणीमात्रांवरुन पडलेली आडनावं मजेशीर असतात.. उदा. मांजरेकर, उंदरे, वाघ, चितळे, सांबारे, मोरे, बिबटे, कोल्हे, कावळे, घारे, वाघमारे, मुंगसे, लांडगे, गरुड, ससे, बकरे, म्हशीलकर, पोळ, इ. जशी आडनावं, तशी ही माणसं असतीलच याची खात्री नसते.. म्हणजे ससे हे धीट असू शकतात, तर वाघ, डरकाळी फोडणे विसरुन मितभाषी झालेले असतात..

काही गंमतीशीर, प्रकृती बिघडल्याची आडनावं पहायला मिळतात.. जसे पादरे, हगवणे, पोटफोडे, पोटे, उचके, लिडबिडे, काणे, शेंबडे, लाळे, खोकले, उकिडवे, हगे, चिपडे, ढोमे, फेंदरे, इ. यांना आपलं आडनाव सांगतानाही, संकोच वाटतो…

काही आडनावं ही, गावातील कार्यपद्धतीवर असतात.. जसे पाटील, नगरकर, कुलकर्णी, मास्तर, सरपंच, सरंजामे, इनामदार, सुभेदार, हवालदार, भालकर, मोहिते, पवार, ठाकूर, ठाकरे, देशपांडे, मेश्राम, इ.  अशा नावांना, मान असतो..

चलनावर देखील आडनावं असतात, जसे पगारे, रोकडे, सहस्त्रभोजने, लाखे, कोटस्थाने, तिजोरे, हजारे, फुकटे, पावले, सोळशे, तनखीवाले, इ. यांच्या नावातच ‘नगद नारायण’ असल्यामुळे, यांची ‘चलती’ असते..

आवाज दर्शवणारीही आडनावं असतात.. जसे बोंबले, कोकले, घुमे, बडबडे, बोबडे, मुके, हर्षे, खिंकाळे, गोंधळे, तावडे, आकांत, घोगरे, इ. 

गाव व शहरावरुन पडलेली आडनावं.. शेगांवकर, किर्लोस्कर, चिपळूणकर, कराडे, गोवेकर, सासवडकर, जिंतीकर, उसगांवकर, धारवाडकर, सोलापूरकर, मुरुडकर, पावसकर, नाशिककर, नागपुरे, मालवणकर, पुणेकर, दादरकर, वसईकर, इ. यांनी आपलं गाव सोडून पन्नास वर्षे झाली तरी आडनावाची नाळ तुटलेली नसते..

काही आडनावं चवदार, टेस्टी असतात.. जसं गोडे, आंबट, कडू, दहिवळे, ताकवले, श्रीखंडे, चक्के, कडबोळे, करंजे, पुरी, हलवाई, झणकर, हिंगमिरे, आवळे, बोरे, चिंचोरे, डाळिंबे, इ. ही नावं घेतली तरी त्यांच्या अनुभवाची चव आठवते..

आडनावांचा हा धांडोळा, थोडक्यात आटोपता घेतो.. कारण याला अंत नाही.. एवढी विविधता असूनही, काही आडनावे ही अविस्मरणीय अशीच आहेत.. कारण त्या व्यक्तींचं योगदान मोलाचे आहे…

उदा. अत्रे, म्हटलं की प्रल्हाद केशव अत्रे, देशपांडे म्हटलं की, पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे, सावरकर म्हटलं की, विनायक दामोदर सावरकर, शेळके म्हटलं की, शांताबाई शेळके, घाणेकर म्हटलं की, काशिनाथ घाणेकर, दलाल म्हटलं की, दीनानाथ दलाल, पंडित म्हटलं की, एस. एम. पंडितच आठवतात… ही आडनावांतली जादू आहे.. त्या माणसांचं मोठेपण, त्या नावाला चिकटलेलं असतं… ते नाव तसंच तेजोमय राखण्यासाठी, त्याला जपावं लागतं.. नाहीतर ‘ नाव मोठं, लक्षण खोटं ‘ व्हायला वेळ लागत नाही…

हा लेख जर शेक्सपिअरने वाचला असता, तर नक्कीच तो ‘ ओशाळला ‘ असता… हे नक्की!!

© सुरेश नावडकर

११-६-२२

मोबाईल ९७३००३४२८४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गोपीचंदन… ☆ प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ गोपीचंदन… ☆ प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆ 

रुक्मिणी कृष्णाला विचारते ,” आम्ही तुमची येवढी सेवा करतो पण तरीही गोपींना तुम्ही विसरत नाही. असे का ? “

कृष्ण काहीही उत्तर देत नाही.

एकदा कृष्णाच्या छातीत जळजळ होत असते. कृष्ण अस्वस्थ असतात. सगळे उपचार करूनही बरे वाटत नाही. वैद्यही हात टेकतात. रुक्मिणी कृष्णाला शरण जाते. “आता तुम्हीच उपचार सांगा. आम्ही ताबडतोब अमलात आणू.”

श्रीकृष्ण म्हणतात, ” जो माझा खरा भक्त आहे त्याच्या पायाची धूळ छातीवर लावा. मला बरं वाटेल. “

महालातील सर्व जण आपल्या पायाची धूळ द्यायला नाही म्हणतात. रुख्मिणी म्हणते, ” मी खरी भक्त आहे.पण प्रत्यक्ष पती परमेश्वराला माझ्या पायाची धूळ ? माझी योग्यताच नाही, सात जन्म मी नरकात जाईन.”

हळूहळू वार्ता द्वारकेत पोहचते. इकडे वेदना तर वाढतच आहेत. सर्वजण रुख्मिणीसारखाच विचार करतात. आणि चरणरज राजवाड्यावर पोहचत नाही. 

दवंडी पिटणा-यांना गावं वाटून देतात. सर्वदूर दवंडी पिटणारे जातात. एक जण गोकुळात जातो.

दवंडी पिटताच सर्व गोपी विचारतात, “ काय करायला लागेल ते सांगा ! “

“ एका घमेल्यात बारीक रेती आणलेली आहे .त्यात उभे रहायचे आणि सारी माती तुडवायची. आम्ही ही माती घेऊन प्रभूंच्या वक्षस्थळी लावू. मात्र माती तुडवणारा प्रभूंचा खरा  भक्त असला पाहिजे. यानेच दाह मिटेल.”

गोपी विचारतात, “ मग  रुख्मिणीमातेने असे नाही केले ?”

दवंडीवाला सांगतो,  ” प्रत्यक्ष परमेश्वराला माझ्या पायाची धूळ लावून मी पापी होईन. सात जन्म नरकात रहावे लागेल  असं त्या म्हणाल्या.”

सर्व गोपी तात्काळ म्हणाल्या, ” जर  श्रीकृष्णाला बरं वाटणार असेल तर आम्ही सात जन्मच काय, शंभर जन्मही नरकात राहू. द्या ती माती  इकडे.” आणि प्रत्येक गोपी ती माती तुडवते.

पुढे ही माती श्रीकृष्णाच्या छातीवर लावली जाते आणि त्यांचा दाह शमतो.

मित्रांनो हेच ते “गोपीचंदन”.  याने दाह कमी होतो.

संग्रहिका – सौ. मेधा सहस्रबुद्धे

पुणे

मो  9420861468

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ज्ञानोबा तुकाराम –भाग– 3–लेखक– श्री आशुतोष अनिलराव बडवे पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

ज्ञानोबा तुकाराम  – भाग – 3 – लेखक – श्री आशुतोष अनिलराव बडवे पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे  ☆

(आश्चर्यमुग्ध महर्षी नारदाचा भाव त्या महान व्यक्तीच्या मुखावर आता प्रगटला होता. ) – इथून पुढे —-

देव भक्ताची पूजा करतो हे ज्ञात होतं. देव भक्तासोबत नाचतो, गातो, खेळतो हेही ज्ञात होतं. कारण कृष्णावतारात वृंदावनी गोपगोपिकांबरोबर त्याने महा रासगरबा केला होता. गोपांसवे यमुनातटी अन् विष्णुपदी शिदोऱ्या एक करून काला करून खाल्ला. एकमेकांना खावू घातला होता, हे सगळ्यांनाच माहीत होतं. सारे लोक नवविधभक्तीतून भगवंत पूजन करतात. पण भगवान भक्तीचा भुकेला, भक्तांचा भुकेला आहे.  तो भक्तांचे पूजन करतो.. त्याचे गुणवर्णन ऐकतो. नव्हे स्वतः त्याचे नाव घेऊन भावविभोर होऊन नाचतो, हे त्या व्यक्तीने आपल्या डोळ्यांनी पाहिलं. डोळ्यांवर विश्वास बसेना. आपण काय पाहतो ते समजेना. पण ते सारं डोळ्यासमोर घडत होतं .नारदांनी केवळ बसून भक्ताची पूजा करताना पाहिलं होतं. आपण भक्ताचा नामघोष करत नर्तन करताना पाहतो आहोत  याचा आनंद झाला.  देव नाचतो याची गंमत वाटली. आणि तेही भक्तनावाचा जप करीत नाचतो याचं आश्चर्य वाटलं. 

मगापर्यंत आजचे देवदर्शन चुकले याची चुटपुट होती, पण आता सगळे बदलले. आनंद, परमानंद झाला. सुखाच्या अत्युच्च शिखरावर स्वार झाल्यासारखं वाटू लागलं. आपण काही आगळेवेगळे पाहिल्याची ऐकल्याची भावना हृदयात प्रज्वलित झाली. जीव तृप्तला. समाधान पावला. अमृतपानाहूनही हे भक्त-नामामृत रसपान अद्भुत होतं. ते पाहिल्याचं समाधान होतं. ते अनुभवल्याचा आनंद होता. परमानंद होता..

आज देवदर्शन मुकले नाही तर खरं देवदर्शन घडलं. खरं देवदर्शन झाल्याचा आनंद झाला. 

किती वेळा ते दृष्य पाहिलं माहित नाही, कळलं नाही. त्या तंद्रीतच ती व्यक्ती नाचू लागली. तीही व्यक्ती तोंडाने म्हणू लागली —

“ज्ञानोबा – तुकाराम”, 

“ज्ञानोबा  – तुकाराम”. 

खरंच संतांच्या नामस्मरणाचा काय आनंद होतो ते ती व्यक्ती अनुभवत होती.  

आता तिचं भान हरपून गेलं होतं. पहाट झाली. काकडआरतीसाठी मंडळी मंदिराकडे आली आणि त्यांनी तिला हलविले अन् ती व्यक्ती भानावर आली. शरीराने ऐहिक जगातील नित्यक्रम करू लागली. पण मन मात्र सुखाच्या कारंजाप्रमाणे नाचत होतं. ‘भक्तभजन’ रंगात दिवसभर मन तिकडेच होतं. दुसरीकडे चिंतन सुरु झालं- हे काय अद्भुत? ज्या भगवंताच्या नामस्मरणाने काय साध्य होते ते आपण वाचतो, ऐकतो, त्याचे महात्म्य सांगतो, तो स्वत:च संतनामात एवढा दंग होतो? ‘ याचा अर्थ त्याला स्वतःच्या नावापेक्षा भक्तनामघोष अधिक आवडतो . म्हणून आपणही तोच नामजप करावा. तोच आपल्यासाठी भक्तीमंत्र आहे. तोच आपल्यासाठी शक्तीमंत्र आहे. तोच आपल्यासाठी तारकमंत्र आहे. त्याचाच प्रसार झाला पाहिजे, नव्हे तो केला पाहिजे आणि तो मी केला पाहिजे. मला ते दर्शन घडले. मला ते ऐकायला मिळाले. तोच वारकऱ्यांचा तारक मंत्र आहे.’ 

आणि मग साऱ्या भक्तमंडळींना जमवून त्याबद्दल सविस्तर कथन केलं. 

काहींनी मानलं, काहींनी विरोध केला. आम्हाला अनुभुती आल्याशिवाय आम्ही का ऐकावे म्हणून काहींनी विरोध केला. त्यांच्या भजनावेळी टाळ पखवाज वाजवले तरी आवाज बाहेर येईना. कितीही प्रयत्न करून, अक्षरश: बडवूनही स्वर येईना. मग भजनरंगी भक्तरसात येऊन संत स्तवन झालं, ” ज्ञानोबा – तुकाराम ” बोल तोंडातून बाहेर पडले अन् मगच टाळ आणि पखवाज पुन्हा घुमु लागले. ” ज्ञानोबा – तुकाराम.” 

—हाच मंत्र आज साऱ्या वारकरी संप्रदायाला शक्ती प्रदान करणारा, भक्तिरसात चिंब करणारा, शक्ती- भक्ती- मंत्र म्हणून प्रचलित आहे. तोच नामजप केल्याशिवाय कुठलीही दिंडी निघत नाही. कुठलेही भजन सुरू होत नाही.  कुठलेही कीर्तन संपत नाही. 

कोणाही थकल्या मरगळलेल्या व्यक्तीलाच नव्हे, तर मृत्युशय्येवरच्या व्यक्तीलाही “ज्ञानोबा” ऐकलं की “तुकाराम” शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडतात “ज्ञानोबा तुकाराम” हीच महाराष्ट्राची खरी भक्तीधारा आहे. हीच खरी शक्तीधारा आहे. हीच खरी विचारधारा आहे. भगवंतापासून प्रवाहित होवून ती समस्त वारकरी बांधवांपर्यंत आणून त्यांना त्यात सुस्नात करणारी ती महान व्यक्ती म्हणजे ‘ श्री संत प्रल्हाद महाराज बडवे ‘ होत. भक्तनाम गात नर्तन करणाऱ्या भगवंताचे दर्शन त्यांना घडले. ” ज्ञानोबा-तुकाराम ” हे भगवंतोद्गार पहिल्यांदा त्यांनी ऐकले. पाहिले. ते त्यांनीच पुढे प्रचारित केले. त्यामुळे सकल वारकरी भक्तांच्या मनात त्यांचे विषयी ममत्व आहे. वारकरी त्यांचे चरणी लीन होतात. त्यांना सन्मानित करतात. 

शके १५४२ मधे विठूरायाच्या परंपरागत पूजा-अर्चन करणाऱ्या बडवे कुळात जन्म घेतलेल्या प्रल्हाद महाराजांचा शके  १६४० (सन १७१८) हा समाधी काळ आहे. म्हणजे सुमारे ३५० वर्षे या घटनेला झाली.  तरी आजही नामदास महाराज फडावर, वासकर फडावर, आजरेकर फडावर, शिरवळकर फडावर, धोंडोपतदादांचे फडावर, बाबा महाराज सातारकरांचे फडावर तसेच दस्तापुरकरपासून ते कान्हेगांवकरांपर्यंतच्या साऱ्या महाराज मंडळात अन् विदर्भ, खानदेश, मराठवाड्यापासून ते कोकणापावेतोच्या सकल वारकरी सप्ताहात ही सत्यकथा, मंत्रकथा, दिव्यकथा, देवानुभुती कथा, देवलीला म्हणून सांगितली जाते. अन् लोक प्रल्हाद महाराजांचे चरणी नतमस्तक होतात.

— समाप्त —

लेखक : श्री आशुतोष अनिलराव बडवे पाटील. 

पंढरपूर ( फेसबुक वरून साभार ) 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ज्ञानोबा तुकाराम –भाग– 2–लेखक– श्री आशुतोष अनिलराव बडवे पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

ज्ञानोबा तुकाराम  – भाग – 1 – लेखक – श्री आशुतोष अनिलराव बडवे पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे  ☆

( आणि ती व्यक्ती घराकडं गेली. गाडीवान गाडी घेऊन जागेला गेला.) इथून पुढे —-

देवळात अंधारच होता. कुठेतरी बारीक ठाणवई, एखादी पणती मिणमिणत होती. सारं काही सुमसाम झालं होतं . मंडपात माणसं घोरत पडली होती. त्या कोणत्याही गोष्टीकडे न पाहता मंडप पार करत अंधारातून ठेचकाळत एक एक अडथळे पार करून ती व्यक्ती देवाच्या गाभाऱ्यापर्यंत गेली. दाराशी आली. पळत आली. तर दाराला भलं मोठं कुलूप घातलं होतं.

आता हुरहूर जीव घेणारी ठरली. हुरहूर होती आज देवदर्शन मुकले याची. तसंच तगमगत दारासमोर साष्टांग दंडवत घातला. तिथेच नामस्मरण करत मांडी ठोकली. 

सगळीकडे शांतता होती. तेवढ्यात काही अस्पष्ट अस्पष्ट आवाज ऐकू यायला लागला. त्या व्यक्तीने इकडे तिकडे पाहिलं तर कुणीच नाही. मग आवाज कसला येतोय. बारीक बारीक किण किण करणारा पैंजणांचा आवाज. त्याचबरोबर चिपळ्यांचा स्वर. काही पुटपुटल्याचा आवाज. पैंजण वाजताहेत म्हणून बाई म्हणावं तर सोबत चिपळ्या वाजताहेत? स्वर ही पुरूषी येतोय?

कुठून स्वर येतोय? 

पैंजण कसले वाजताहेत? 

चिपळ्या कोठून वाजताहेत? 

आवाज कसला येतोय? 

याचा शोध सुरू झाला तर आवाजाची दिशा गाभाऱ्याकडे चालली. 

त्या व्यक्तीला वाटलं गाभाऱ्यात कोणी भक्त, भाविक, वारकरी अडकला असावा. चुकून कोंडला गेला असावा. रात्रीच्या गडबडीत राहिला असेल. आता रात्रभर बिचारा अडकेल. आणखी जरा पहावं म्हणून गाभाऱ्याचे दाराला असलेल्या छिद्रातून त्या व्यक्तीने आत दृष्टी टाकली, इकडे तिकडे शोधक नजरेने ठाव घेतला. कोणी दिसेना. येणारा आवाज मात्र गडद झाला. तेवढ्यात लक्ष सिंहासनाकडे गेलं तर आसनावर देव नाहीत. केवळ सिंहासन होते. समोर मात्र सर्वत्र प्रभा फाकणारा हिरेजडित सोन्याचा देवकिरिट सिंहासनावर ठेवलेला होता. मगाचची भक्त अडकल्याची चिंता कुठल्या कुठे पळाली. आता देव कुठे आहे? याची चिंता सुरू झाली. कोणते विघ्न तर आले नाही ना?  कोणीही मोगली यवन सरदार अवचित आला नाही, तरीही देव कसे जागा सोडून गेले? आतून आवाज येतोय? काय करावे? कसे शोधावे? कोणाला चौकशी करावी? रात्र पडली,  काहीच कळेना. 

तेवढ्यात एका खांबाआडून एक दिव्य देहधारी मानवाकृती बाहेर पडल्यासारखी दिसली. निरखून पाहतो तो खांद्यावर जरतारी रेशमी शेला, गळ्यात वैजयंती माळा, नर्तनाच्या पदलालित्यावर डोलत होत्या, डोईचे कुळकुळीत केस खांद्यावर रूळत आहेत. कमरेचा पितांबर हालतोय. दोन्ही हाती वाजत चिपळ्या होत्या. पायातले रत्नजडित तोडर बारिक बारिक वाजत होते. नेत्रकमल मिटलेले होते. नर्तन करीत करीत तोंडातून स्वर बाहेर येत होते —-

” ज्ञानोबा – तुकाराम “. 

” ज्ञानोबा – तुकाराम ” 

ती कोणी वारकरी व्यक्ती नव्हती.  ती व्यक्ती कोणी सामान्य दिसत नव्हती. तर प्रत्यक्ष परमात्मा पांडुरंग बेभान होऊन गाभाऱ्यात नाचत होता आणि तोंडाने म्हणत होता ” ज्ञानोबा – तुकाराम ”  ” ज्ञानोबा – तुकाराम “.

 मघापर्यंत चिंतातूर असणाऱ्या त्या व्यक्तीच्या चेहऱ्याचे भाव बदलले. चिंता बदलली. क्षणात आश्चर्य, क्षणात आनंद , क्षणात गंमत आलटून पालटून बदलत होती. आश्चर्य होते आपण काही अद्भूत पाहत आहोत याचे. दिसतेय ते काही विलक्षण आहे याचे. आनंद होता तो परमात्म्याचे आगळ्यावेगळ्या दर्शनाचा. दिव्य दर्शनाचा. आतापर्यंत परमात्मा असा भक्त-नाम गात नाचल्याचे वाचले वा ऐकले नव्हते. जो यति, योगी, तपी, ताडसी, यांना जपतपादी साधने वापरूनही सहज साध्य होत नाही, तो आपल्या दिठीसमोर नाचत असल्याचे पाहून गंमत वाटत होती. आनंद होत होता. तो परमात्मा केवळ दिव्यदृष्टी धारण करूनच दिसू शकतो असे ज्ञात होते. कारण महाभारतात त्याचं तेज दृष्टीला सहन न झाल्याने तो प्रत्यक्ष समोर असून अनेकांनी डोळे मिटले होते. तेज सहन न झाल्याने ते मिटावे लागले होते. डोळे मिटून घेवूनही त्याचे तेज डोळ्यांना सोसत नव्हते. तो दिव्य प्रकाशधारी, नव्हे शतसूर्य– नव्हे नव्हे कोटी भास्कराचे तेज ज्याचेपासून उगम पावते असा परमात्मा आपल्यासमोर नर्तन करतोय याची गंमत वाटत होती. आनंद वाटत होता. आश्चर्य वाटत होते. अनेकांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा हा परमात्मा, हे परब्रह्म, त्या व्यक्तीच्या दृष्टीसमोर स्वतः एका वेगळ्या तालावर नाचत होते. अगदी देहभान हरपून. अन् तोंडाने बोलत होते–”ज्ञानोबा-तुकाराम”

आजपर्यंत पुराणात वाचलं होतं, ऐकलं होतं की, एकदा भगवंताचे गृही नारद आले. सेवक बोलले देव देवपूजा करत आहेत. देवर्षी नारद आश्चर्यचकित झाले.. ते म्हणाले देव कोणाची पूजा करतात पाहू या. म्हणून ते देवघरात हलकेच प्रवेशले. तो देवपाटावर एक एक देव मांडले होते. आणि देव पूजनात दंग होते. ते देव म्हणजे आपल्यासारख्या  देवप्रतिमा नव्हत्या. होत्या भक्त प्रतिमा. भक्त उद्धव, भक्त अक्रूर, भक्त नारद, भक्त हनुमान. आश्चर्यमुग्ध महर्षी नारदाचा भाव त्या महान व्यक्तीच्या मुखावर आता प्रगटला होता. 

क्रमशः …

लेखक : श्री आशुतोष अनिलराव बडवे पाटील. 

पंढरपूर ( फेसबुक वरून साभार ) 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ज्ञानोबा तुकाराम  – भाग – 1 – लेखक – श्री आशुतोष अनिलराव बडवे पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

ज्ञानोबा तुकाराम  – भाग – 1 – लेखक – श्री आशुतोष अनिलराव बडवे पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे  ☆

संप्रदाय म्हटले की दैवत आले. देवस्थान आले. क्षेत्र आले. तीर्थ आले. पथदर्शक श्रेष्ठी आले. संत आले.  वाड्मय आले. तत्वज्ञान आले. देवकर्म आले. नित्यपाठ आला. जप आला. शिष्य अथवा लोकसमुदाय आला. संप्रदायाचा मंत्र आला. मग तो कोणताही संप्रदाय असो. शैव असो वा वैष्णव. रामानुज असो वा निंबार्क. गाणपत्य असो वा कापालिक. राधा संप्रदाय असो वा स्वामी नारायण. 

मग वारकरी संप्रदाय तरी त्याला अपवाद कसा असणार. त्यालाही दैवत आहे. विग्रह आहे. देवस्थान आहे. क्षेत्र आहे. तीर्थ आहे. मार्ग दाखविणारे संत आहेत. देवाच्या अन् संतांच्याही लीला आहेत. देवकर्म आहे. ज्ञान आहे. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो म्हणत जगाला कवेत घेणारे तत्वज्ञान आहे. गाथा- भागवत- ज्ञानेश्वरीसारखे वाङ्मयीन ग्रंथ आहेत. वारीसारखा नियम आहे. तो निष्ठेने पाळणारे हजारो वारकरी आहेत. हरिपाठासारखा नित्यपाठ आहे. अन् रामकृष्णहरीसारखा उघडा मंत्रही आहे. 

कारण, उघडा मंत्र जाणा | रामकृष्णहरी म्हणा ।। असे संप्रदायामध्ये म्हटले जाते. तसेच रामकृष्णहरी विठ्ठल केशवा | मंत्र हा जपावा सर्वकाळ ।। असेही संतवचन आहे. म्हणजे “रामकृष्णहरी  ” हा वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे. तोही उघडा आहे. पडद्याआड झाकून द्यायचा, कानात सांगावयाचा असा मंत्र नाही. 

हे सारे ठसठशीत उघड सत्य असताना मग सारे वारकरी अनेक कीर्तनात, भजनात, दिंडीत, अगदी आळंदीहून देहू- -हून येणाऱ्या पालखी सोहळ्यातही वा अन्य सोहोळ्यातही ” ज्ञानोबा तुकाराम ” हा मंत्रघोष का करतात? अन् त्याचेच भजन अविरत का करतात? असा प्रश्न मला एका वारकरी अभ्यासक मित्राने केला. अन् त्या मंत्रामागची सारी कथाच त्याला उलगडून सांगावी लागली. 

हा मंत्र का निर्माण झाला? 

त्याचा पहिला उच्चार कोणी केला? कोणी ऐकला? 

त्याने तो लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी काय केले? 

वारकऱ्यांनी तो सहज स्वीकारला का? 

कारण वारकरी हा कोणतीही गोष्ट पारखून घेणारा आहे ना? ही प्रश्नाची मालिकाच त्याने मजपुढे उभी केली. अन् मग त्याला सारे बैजवार सांगावे लागले. 

तेच साऱ्या वारकरी बांधवांना ज्ञात आहे. पण इतर समाजालाही कळावे, नव्याने वाचन चिंतन अभ्यास करणाऱ्यांनाही कळावे, म्हणून हा कथा प्रपंच——

सूर्य बुडाला. सांज पडली. सर्वत्र सामसुम झाली. रातकिड्यांनी किर्र करीत कोपरे धरून आरडायला सुरुवात केली. अंधार अजून वाढला. रात्र पडायच्या आत गावी पोहोचायला हवं. म्हणूनच गाडीवानाने बैलं दामटली. बैलांना पराण्या टोचटोचून गाडीवान हैराण झाला होता. पण अंतरच एवढं होतं की बैलं  काय करणार ? कितीही पळून पळूनही  ते अंतर पार पडणार नव्हतं. बैल घामाने निथळत होते. तोंडाने फेस पडत होता.

आत बैलगाडीत बसलेले ग्रहस्त चिंतातुर होते. तोंडाने नामस्मरण चाललं होतं. चेहऱ्यावर काळजीचे भाव होते. गाडीवाटेचा रस्ता शेताशेतातून वळणे वळसे घेत दौडत होता. त्यात रात्रीचा अंधार होता म्हणून गाडीत लावलेला दिवा फुरफुरत होता. बैलाच्या गळ्यातल्या चंगाळ्या खुळखुळत होत्या. गाडीवानाचा ओरडाआरडा, बैलांच्या पायाचा  खडखडाट, दिव्याच्या फुरफुरण्याच्या आवाजात भर घालत होता. गाडीतल्या गृहस्थाची चिंता, तगमग वाढत होती. चिंता  प्रवासात रात्र झाल्याची, गाव अजून न आल्याची होतीच. पण त्याहून जास्त ती होती ते नित्यनेमाचं देवदर्शन आज बुडल्याची. आज पांडुरंग आपल्याला अंतरला याची.

भल्या पहाटे कामास्तव बाहेरगावी आलो. तेव्हा वाटलं की संध्याकाळी लवकर घरी परतू. नित्याचे देवदर्शन घडेल. देवदर्शनाच्या नियमाला अंतर पडणार नाही हा विचार होता. पण कामाच्या रामरगाड्यात दिवस कधी उलटला आणि सांज झाली ते कळलंच नाही. तरी गडबडीने आवराआवर करून निघेस्तोवर उशीर झालाच. आजपावेतो देवाचं नित्य दर्शन झाल्याशिवाय दिवस गेला नव्हता.आज मात्र दैवाने उशीर केला. गावी, घरी परतेपावेतो रात्र झाल्याने गर्दी ओसरलेली असेल,आरती होऊन मंदिर बंद होईल. काय करावं कळेनासं झालं. रात्रीच्या काळोखाबरोबर चिंता वाढत होती. गाडीवानाच्या आणि बैलांच्या गोंगाटाने त्यात भर पडत होती. चंगाळ्यांचा खुळखुळाट अन् गाडीच्या चाकाच्या धावांचा खडखडाट क्षणाक्षणाला त्यात वाढ करीत होता. तोंडाने सतत ” रामकृष्णहरि ” म्हणत देवाचा धावा चालूच होता.

अखेर गाव आलं. सगळीकडे एकदम चिडीचूप झालं होतं. वेशीवरचा तराळ एके हाती फुरफुरणारी मशाल अन् दुसरे हाती लखलखणारा भाला चमकवीत गाडीजवळ आला. त्याने पुसलं, ” कोण हायं? “

तशी आतली व्यक्ती बाहेर पडली.  त्यांनी जवळजवळ गाडीतून उडीच मारली. डोक्यावरचं पागोट, अंगरखा उपरण्याचं बोचकं काखेला लावून त्यानं देवाकडे, देवळाकडे पळायला सुरुवात केली. तराळानं ओळखून जोहार घातला खरा. पण त्याच्याकडे त्या व्यक्तीचं लक्ष नव्हतं. त्याचं चित्त होतं देवळाकडं, देवाकडे. 

धावत धावत रावळाच्या पायऱ्या मोठ्या मोठ्या ढांगा टाकत त्यांनी पार केल्या. सोबतच्या माणसाकडे पळता – पळता हातातले कापडे टाकून घरी द्यायला सांगितली. आणि ती व्यक्ती घराकडं गेली. गाडीवान गाडी घेऊन जागेला गेला.

क्रमशः …

लेखक : श्री आशुतोष अनिलराव बडवे पाटील. 

पंढरपूर ( फेसबुक वरून साभार ) 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मृदंग शैलेश्वरी मंदिर – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ मृदंग शैलेश्वरी मंदिर – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆ 

भारतात चोरीमुळे प्रसिद्ध झालेले एक प्राचीन मंदिर आहे. अलीकडच्या इतिहासात चार वेळा चोरांनी मंदिराची मूर्ति चोरली, पण ती परत केली. कारण ते त्यासोबत फार दूर जाऊ शकत नव्हते.

त्यांनी दिलेल्या कारणांमुळे कथा आणखीनच वेधक बनते.

मृदंग शैलेश्वरी मंदिर हे केरळ राज्याच्या दक्षिणेकडील मुझाकुन्नू – कन्नूर जिल्ह्यातस्थित एक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर परशुराम ऋषींनी स्थापन केलेल्या 108 मंदिरांपैकी एक आहे.

मंदिराला “मृदंग सैलेश्वरी” असे नाव पडण्यामागे एक कथा आहे.

मृदंग हे प्राचीन भारतातील तालवाद्य आहे. प्राचीन हिंदू शिल्पकलेमध्ये, मृदंग हे अनेकदा गणेश आणि नंदी, शिवाचे वाहन आणि अनुयायी या हिंदू देवतांच्या निवडीचे साधन म्हणून चित्रित केले जाते. मृदंग हे देववाद्य किंवा देवांचे वाद्य म्हणूनही ओळखले जाते. असे मानले जाते की या ठिकाणी स्वर्गातून मृदंगाच्या आकारातील खडकाचा तुकडा, कदाचित एक उल्का पडली आणि ऋषी परशुरामांनी देवीचे अस्तित्व जाणवून तिला खडकात बोलावले आणि तिच्यासाठी मंदिराची स्थापना केली.

मृदंग शैलेश्वरी मंदिर हे दक्षिण भारतीय शास्त्रीय नृत्य कथकलीचे जन्मस्थान मानले जाते. या मंदिरात देवीशक्ती काली, सरस्वती आणि लक्ष्मी या तीन रूपात विराजमान आहे.

काही वर्षांपूर्वी केरळ राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक श्री. अलेक्झांडर जेकब यांनी मागील काही वर्षांत या मंदिरात झालेल्या चार दरोड्यांच्या कथा सार्वजनिक केल्या. मंदिरातील मूर्तीची अंदाजे किंमत सुमारे दीड कोटी आहे. मंदिराभोवती कोणतीही सुरक्षा नसल्याने ते चोरांचे सोपे लक्ष्य होते.

मंदिरातील पहिली फोड १९७९ मध्ये झाली. चोरट्यांनी मंदिरातून मूर्ति नेली, परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरापासून काही मीटर अंतरावर मूर्ति टाकून दिल्याचे आढळून आले. पोलिसांना गुन्हेगार शोधता आले नाहीत. विधीनुसार मूर्तीचे पुनर्वसन करण्यात आले. हा विधी ४१ दिवस चालतो आणि त्यासाठी विशिष्ट मंत्रांचे ४१ लाख वेळा पठण करावे लागते .

काही वर्षांनी कथेची पुनरावृत्ती झाली. मात्र यावेळी पोलिसांना मूर्ति सापडली नाही आणि कोणताही सुगावा न लागल्याने तपास रखडला. मंदिराच्या अधिकाऱ्यांनी “अष्टमंगला देवप्रश्न ” विचारण्याचा निर्णय घेतला. कारणे शोधण्यासाठी आणि उपचारात्मक कृतींचे नियोजन करण्यासाठी अष्टमंगला देवप्रश्न केले जाते.

देवप्रश्नाने, मूर्ति तामिळनाडूच्या दिशेने प्रवास करत होती, परंतू देवीची शक्तिशाली मूर्ति तिच्या स्वतःच्या दैवी सामर्थ्याने तिच्या निवासस्थानी परत येईल, अशी गणना केली गेली.

अंदाजानुसार, 42 व्या दिवशी, पोलिसांना तामिळनाडूजवळील पलकत येथे एका महामार्गाजवळ एक बेबंद मूर्तीची माहिती मिळाली, ज्यामध्ये एक चिठ्ठी शिल्लक आहे. चिठ्ठीत लिहिले होते – “ मूर्ति मृदंग शैलेश्वरी मंदिरातील आहे, आम्ही ती पुढे नेण्यास सक्षम नाही. कृपया ती मंदिरात परत करा.” 41 दिवस चालणार्‍या धार्मिक विधींसह मागील वेळेप्रमाणे पुन्हा मूर्तीचे पुनर्संचय करण्यात आले. मात्र यावेळीही पोलिसांना चोरट्यांचा माग काढता आला नाही.

ही दुसरी वेळ असल्याने तेथे पोलिस पहारा देऊन मंदिराची सुरक्षा वाढवण्याची सूचना पोलिसांनी केली. परंतू देवी स्वतःचे रक्षण करू शकते असे सांगून मंदिर प्रशासनाने हा प्रस्ताव नाकारला.

लवकरच चोरांनी तिसऱ्यांदा धडक दिली– यावेळी कर्नाटक राज्यातील टोळी. पोलिसांपासून वाचण्यासाठी त्यांनी वायनाडच्या जंगलातून कर्नाटककडे जाण्याचा मार्ग आखला. पुढचे तीन दिवस पोलिसांना सुगावा लागला नाही, पण या वेळी, मंदिराचे अधिकारी आणि स्थानिक लोक या दोघांनाही विश्वास होता की देवी परतीचा मार्ग शोधेल, जरी पोलिस दोषींना शोधण्यात अपयशी ठरले तरीही .

तिसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास, केरळमधील वायनाडमधील कलपट्टा येथील एका लॉजमधून पोलिसांना एक निनावी कॉल आला. फोन करणार्‍याने टोळीतील एक सदस्य म्हणून स्वतःची ओळख करून दिली आणि मूर्तीच्या स्थानाची माहिती दिली. त्यांना मूर्ती सोबत नेणे शक्य नसल्याचे कारण देत त्यांनी पोलिसांना मूर्ती मंदिरात परत करण्याची विनंती केली. पोलिसांना लॉजवर मूर्ती सापडली, फुलं वाहिलेली, आणि मूर्तीजवळ दिवा लावलेला होता. नेहमीच्या विधीनंतर मूर्ती पुन्हा अभिषिक्त करण्यात आली.

दुसऱ्या एका दरोड्याच्या प्रयत्नात पोलिसांनी अकस्मात यश मिळवले. तामिळनाडूतील मूर्तिचोरांची टोळी कोचीनमधील दुसऱ्या मंदिरातून मूर्ती चोरण्याचा प्रयत्न करताना पकडण्यात आली. त्यांनी काही वर्षांपूर्वी मृदंग शैलेश्वरीची मूर्ति चोरल्याची कबुली दिली होती. त्याच प्रकारे, तिसऱ्या दरोड्याच्या प्रयत्नामागील लोकदेखील केरळमधील कासारगोड येथील मंदिरातून मूर्ति चोरण्याचा प्रयत्न करताना चुकून पकडले गेले. त्यांनी मृदंग शैलेश्वरी मंदिरावरील तिसऱ्या दरोड्यातील आपला सहभाग कबूल केला.

साहजिकच, चोरांनी मृदंग शैलेश्वरी मूर्ति अर्ध्यावर सोडून देण्यामागचे कारण पोलिसांनाही जाणून घ्यायचे कुतूहल होते, दोन्ही टोळ्यांनी एकच कारण सांगितल्याने पोलीस चक्रावून गेले.

जेव्हा त्यांनी मूर्तीला स्पर्श केला, तेव्हा त्यांनी दिशा समजण्याची शक्ती गमावली आणि प्रत्येकाने गोंधळलेल्या मनःस्थितीत प्रवेश केला आणि दिशांचे सर्व भान गमावले आणि त्यामुळे ते पुढे जाऊ शकले नाहीत आणि त्यांना अर्ध्यातच मूर्तीचा त्याग करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

तीन अयशस्वी प्रयत्नांनंतरही मूर्ती चोरण्याचा मोह चोरांच्या टोळीला आवरला नाही. यावेळी ही टोळी केरळ राज्यातील अल्पसंख्याक समाजातील अनुभवी चोरांची टोळी होती. मूर्तीच्या अलौकिक शक्तींवर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांनीही मूर्तीचा त्याग केला. नंतर पकडले असता त्यांनी मूर्ती सोडून देण्याचे तेच कारण सांगितले.

आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचा आपण आपल्या बुद्धिमत्तेने आणि आपल्या वैज्ञानिक ज्ञानाने तर्क करू शकत नाही.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print