मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दिवा संध्याकाळी किती वाजता लावावा.….किशोर अभ्यंकर ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

 ☆ दिवा संध्याकाळी किती वाजता लावावा.….किशोर अभ्यंकर ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆ 

(सांजवात ….एक अनुभव)

नमस्कार,

साधारण २५ वर्षापूर्वी मी आणि माझे पती पवई येथील चिन्मयानंद स्वामींच्या आश्रमात गेलो होतो . तेथील शंकर मंदिराच्या आवारात आम्ही बसलो असता ..तेथे बाजूला बसलेल्या एका अमराठी हिंदी भाषिक वयस्कर काकांनी पण आमच्या गप्पात भाग घेतला. त्यांनी एक महत्वपूर्ण माहिती दिली ती अशी—–

काका: आपण सर्वजण संध्याकाळी देवाला दिवा लावतो.

आम्ही : हो बहुतेक सर्व हिंदू लोकं.

काका : का लावतो?

आम्ही : पूर्व परंपरा, घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते !

काका : वेळ कोणती ?

आम्ही : सूर्यास्तानंतर घरच्या गृहिणीच्या सवडीनुसार !

काका : असे का ?

मी: घरातल्या पुरुषवर्गांनी आम्हाला दिलेला हा एकमेव अधिकार.  

काका: आता मी काय सांगतो ऐका… योग्य वाटल्यास त्याचे आचरण करा.. त्याची अनुभूती किंवा प्रचीती आल्यास इतरांना सांगा 

काका: दिवा नेहमी संध्याकाळी ७.३७ मिनिटांनी लावावा.

आम्ही: ७.३७ च का? सर्वांची घड्याळे सारखी नसतात … मग त्याचे काय?

काका : असे सांगितले जाते की जगाची जगन्माता श्री कामाक्षीदेवीच्या मंदिरात तेजोवात अखंड तेवत असते  परंतू  तेथेही एक सांजवात  संध्याकाळी ७.३७ वाजता लावली  जाते. ती सांजवात सूक्ष्म रूपाने अखंड भारत वर्षात घरोघर जाऊन जेथे जेथे दिवा लागला असेल त्या घराचे क्षेम कुशल विचारून पुन्हा जगन्माता श्री कामाक्षीदेवीच्या  मंदिरात तेवत असलेल्या तेजोवातीमध्ये विलीन होते.  त्या घराची, घरधन्याची सुख-दुःखे सांगते. आई कामाक्षी देवी त्याप्रमाणे सर्व अमंगल, अडचणी दूर करते.

आम्ही: ह्या विज्ञान युगात हे खरे कोण मानणार. ह्यावर कोण विश्वास ठेवणार?

काका : तुम्ही तर ठेवाल ना ? तुम्हाला अनुभव आल्यावर इतरांना सांगा किंवा मी नेहमी येथेच असतो मला येऊन सांगा !

आम्ही त्याप्रमाणे दररोज संध्याकाळी ७.३७ ला दिवा लावणे सुरु केले. खरं सांगू  का? काही दिवसाच्या आत आमच्या घरात, आमच्या आर्थिक परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला. हा अनुभव आम्ही इतरांना सांगितला …त्यानाही खूप चांगला अनुभव आला … तुम्हालाही असा अनुभव येवो ही इच्छा!

हा आमचा अनुभव ऐकायला ते काका त्या दिवसापासून तेथे आजतागायत दिसले नाहीत.

आई कामाक्षी देवी तुम्हा सर्वांचे भले करो !!!

 – किशोर अभ्यंकर

संग्राहक : श्री अनंत केळकर   

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हैदराबाद मुक्ती-संग्राम – भाग-3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? इंद्रधनुष्य ?

☆ हैदराबाद मुक्ती-संग्राम – भाग-3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(राष्ट्रसेविका समितीच्या यावर्षीच्या हस्तलिखितामघ्ये  सुश्री पुष्पा प्रभुदेसाई यांच्या या लेखाची निवड झाल्याबद्दल ई – अभिव्यक्ती समूहातर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन, व पुढील साहित्य-वाटचालीसाठी शुभेच्छा.)  

(रोज सकाळी मागचे दार उघडून, आई जनावरांना गोठ्यात पाहून, हात जोडायची. दहा महिने दिवस दिवस  मोजत काढले .अनुभव लिहू तितके कमी ! ) इथून पुढे —-

निजामाने  संयुक्त राष्ट्रसंघाकडे भारताच्या  संभाव्य हस्तक्षेपाबद्दल तक्रार नोंदवली. परिस्थिती ओळखून 9 सप्टेंबर 1948 रोजी श्री. वल्लभभाई पटेल व पंडित नेहरू यांनी सशस्त्र दलाच्या कारवाईचा निर्णय घेतला . रझाकारांची  दहशत आणि जुलूम मोडून काढण्यासाठी ‘कबड्डी ‘, ऑपरेशन सुरू केले. त्यानंतर 13 सप्टेंबर 1948 ला पहाटे चार वाजता जनरल राजेंद्रसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली मेजर जनरल जयंतीनाथ चौधरी यांनी ‘ पोलो ‘ नावाने सैनिकी अँक्शन सुरु केली.  संस्थानच्या तिन्ही बाजूंनी सैन्याने प्रवेश सुरू केला. दोन तासात नळदुर्ग व  तुळजापूर आणि संध्याकाळपर्यंत दौलताबाद काबीज केले. औरंगाबादकडून मेजर जनरल डी. एस. बार यांनी चढाई सुरू केली. तुंगभद्रेवरचा पूल ताब्यात घेतला. तेरणा नदीवरचा पूल उडवला. वरंगळ व बिदरच्या विमानतळावर बाँबफेक केली. 14 सप्टेंबरला जालना, उस्मानाबाद ,येरमाळा, कर्नूल येथील रझाकारांचा  प्रतिकार मोडून काढला.  हुमणाबाद आणि शहागडचा पूल ताब्यात घेतला. 15 सप्टेंबरला औरंगाबाद फत्ते झालं. निजामाचे सैनिक आणि रझाकार मिळून बाराशे जण मारले गेले. भारताचे दहा जवान धारातीर्थी पडले .निजाम सेनेचे प्रमुख अल इद्रिसने 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणागती पत्करली. कासिम रझवी पाकिस्तानात गेला. अटक टाळण्यासाठी निजाम उर्फ मीर उस्मान अली खान याने हैदराबाद रेडिओवरून शरणागती जाहीर केली. लगेच २० सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रसंघाकडे केलेली तक्रार मागे घेतली. ” निजामाच्या राजवटीवर टाच आणण्याचा प्रयत्न केला तर लक्षावधी मुस्लीम प्रतिकारासाठी उतरतील ” अशी धमकी दिली होती. योगायोग असा की कारवाई झाली, त्याच दिवशी जिना यांचं निधन झालं. प्रत्यक्षात हैदराबादचं विलीनीकरण सहजपणे झालं. हैदराबादला  तिरंगा मोठ्या डौलाने फडकायला  लागला. लोक  निजामाच्या जाचातून मुक्त झाले. हैद्राबाद संस्थान, देशाचा अविभाज्य भाग झाला. लोक आनंदोत्सव साजरा करू लागले. हैदराबाद मुक्त झालं तरी, अन्याय्य समाजव्यवस्था मोडून काढण्यासाठी शेतकऱ्यांचा सशस्त्र मुक्ती-लढा चालू ठेवणं आवश्यक आहे, असं म्हणून कम्युनिस्टांनी 1951 पर्यंत आपला लढा चालू ठेवला. 21 ऑक्टोबर 1951 ला देशातील मोठा सशस्त्र लढा संपुष्टात आला. दोनशे वर्षांची इस्लामी राजवट संपुष्टात आली. संपूर्ण भारताचं स्वप्न साकार झालं.

रोज सूर्य उगवतच होता.  पण 15 ऑगस्ट 1947 दिवशी उगवणारा सूर्य वेगळा होता. स्वातंत्र्याची एक रम्य पहाट घेऊन तो उगवला होता. कवी वसंत बापट यांना तेव्हा इतके छान शब्द सुचले होते—-

“शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट.

नव अरुणाचे होऊ आम्ही प्रतिभाशाली भाट “

यावर्षी, भारताच्या 75 वर्षांच्या स्वातंत्र्यदिनाच्या वर्षी, म्हणजेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या वर्षी, सर्वांनी मिळून  नव अरुणाची  स्तुतिसुमने गाऊया. आणि पुढील शताब्दी महोत्सवापर्यंत महासत्ता होण्याचे स्वप्न साकार करू या.

समाप्त

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हैदराबाद मुक्ती-संग्राम – भाग-2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? इंद्रधनुष्य ?

☆ हैदराबाद मुक्ती-संग्राम – भाग-2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(राष्ट्रसेविका समितीच्या यावर्षीच्या हस्तलिखितामघ्ये  सुश्री पुष्पा प्रभुदेसाई यांच्या या लेखाची निवड झाल्याबद्दल ई – अभिव्यक्ती समूहातर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन, व पुढील साहित्य-वाटचालीसाठी शुभेच्छा.)  

(न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हैदराबाद मुक्ती लढ्याचे साक्षेपी अभ्यासक होते.) इथून पुढे —

निजामाने आंदोलने, चळवळी यावर दडपशाही आणि सैन्य दलाचा वापर सुरू केला. त्यासाठी त्यांनी, ‘ इत्तेहादुल मुस्लिमिन ‘ ही राजकीय संघटना, आणि ‘रझाकार ‘ हे सशस्त्र स्वयंसेवक दल स्थापन केले. आणि दहशत माजवायला, त्यांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. रझाकार यांचा आक्रमक व क्रूर नेता ,लातूरचा ‘कासीम रिजवी’ याला हाताशी धरून, सांप्रदायिक भावनेला खतपाणी घालणाऱ्या वृत्तीला उत्तेजन दिलं. शेतातील उभी पिके कापणे, गोठ्यातील जनावरे पळवून नेणे, स्त्रियांना पळवून नेणे, बलात्कार करणे, पुढाऱ्यांचे खून करणे, किती किती म्हणून अमानुष अत्याचार चालले होते. 1946 ते 48  अशी 2 वर्षे जनतेने भीतीदायक वातावरणात  काळरात्रीसारखी काढली .संस्थानात स्त्रियांचे स्थान बालविवाह ,बालविधवा, अज्ञान, निरक्षरता ,दारिद्र्य, अंधश्रद्धा यांनी बरबटलेले होते. अशा परिस्थितीतही ,अनेक कर्तबगार स्त्रियांनी या सत्याग्रहात उडी घेतली होती. दगडाबाई शेळके, वाघमारे ,कुँवर ,पोटेचा, वैशंपायन ,सुशिलाबाई दिवाण यांनी केलेला कामातील सहकार खूपच महत्वपूर्ण ठरला. पत्रके वाटणे ,ग्रंथालयाचे काम, सांस्कृतिक कार्यक्रमातून जनजागृती ,अशी कामे त्या करत. “हैदराबाद मुक्ती संग्रामातील महिलांचे योगदान” हा एक स्वतंत्र संग्राम म्हणून ओळखला जातो. मला अभिमानाने उल्लेख करावासा वाटतो की त्या काळी स्त्रीशिक्षणाच्या तळमळीने, सुशिलाबाई दिवाण यांनी लातूरला मुलींची शाळा सुरू केली. त्या माझ्या मैत्रिणीच्या आई होत. त्या शाळेच्या सुवर्णमहोत्सवाच्या समारंभात, त्यावेळचे  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री मनोहर जोशी यांनी व्यासपीठावरून उतरून, त्यांना नमस्कार करून, सत्कार करून, त्यांच्या कार्याची पोचपावती दिली .

कासीम रझवीचा  हैदोस चालू होता. जवळा हे गावच्या गाव जाळून टाकलं. अनेक कुटुंबांनी स्थलांतर केलं. निजाम हा रेडिओ, वृत्तपत्रं, भाषणं, आदिद्वारे भारत विरोधी प्रचार करून, स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीचा पुनरुच्चार करीत असल्याचं स्पष्ट झालं .माऊंटबॅटननेही  पुढाकार घेतला. पण सगळे प्रयत्न निष्फळ ठरले .अखेर सैनिकी कारवाईचा गांभीर्याने विचार होऊ लागला. ही बातमी निजामाला समजली. त्याने अगोदरच, पोर्तुगाल आणि पाकिस्तानकडून हवाईमार्गाने, तीस लाख  पौंड किमतीची शस्त्रास्त्रे खरेदी करून ठेवली होती. 29 नोव्हेंबर 1947 रोजी त्याच्यासोबत ‘ जैसे थे ‘ करार केला होता. ( भारताशी पूर्ववत् संबंध व संस्थानात शांतता राखावी .) तो करार धुडकावून ,त्याने पाकिस्तानकडे मदत मागितली. कराचीमध्ये आपल्या संस्थानाच्या प्रतिनिधीची नेमणूक केली. भारताचे 20 कोटीचे कर्जरोखे पाकिस्तानला कर्ज देण्यासाठी वापरले.

अखेरचा उपाय म्हणून 9 सप्टेंबर 1948 रोजी गृहमंत्री वल्लभभाई पटेल आणि पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पोलीस ॲक्शन घेण्याचा निर्णय घेतला. आता प्रत्यक्ष लढाई सुरू होणार होती .त्याच दरम्यान, मला माझ्या आईवडिलांनी घेतलेल्या अनुभवाचा अभिमानाने उल्लेख करावासा वाटतो. त्यावेळी मिरज लातूर रेल्वेमार्गावर ढोकी नावाचे स्टेशन होते. निजाम संस्थान, आणि भारताच्या सरहद्दीवरचे ते स्टेशन. माझे वडील तात्या तेथे स्टेशन मास्तर म्हणून रुजू होते. स्टेशनच्या संरक्षणासाठी इब्राहिम, रसूल आणि महंमद हे रखवालदार होते. अनेक स्टेशन मास्तरांनी, आपल्या कुटुंबांना गावी पाठवले होते. अपवाद माझी आई.! स्टेशन मध्ये रोज खुनाच्या, अंदाधुंदीच्या नवनवीन बातम्या यायच्या. गावचा पाटील किशनदास गरड साडी नेसून चुलीजवळ जाऊन बसला. रझाकारांनी ओढत त्याला बाहेर आणले. आणि त्याच वेषात  खच्च केले. रेल्वे स्टेशनमध्ये आप्पा पोर्टरचा खून झाला. तात्या ‘नको नको रे ‘ म्हणत असता “आता तुम्हालाही फुंकून टाकू. गप्प बसा ” ,शब्द ऐकायला येऊ लागले. मुसलमान स्त्रिया बाळांना दूध मागण्यासाठी मागच्या अंगणात आल्या. जात धर्म न पाहता तंग वातावरणातही  आईने माणुसकी जपली. म्हैस व्यालेली होती .लहान बाळांना  का जात धर्म असतो ? असं म्हणून बाळांसाठी दूध  देऊन त्यांना परत पाठवून दिलं .तात्याही गावकऱ्यांना शक्य होईल ती मदत करत होते. रोज सकाळी मागचे दार उघडून, आई जनावरांना गोठ्यात पाहून, हात जोडायची. दहा महिने दिवस दिवस  मोजत काढले .अनुभव लिहू तितके कमी !

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हैदराबाद मुक्ती-संग्राम – भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? इंद्रधनुष्य ?

☆ हैदराबाद मुक्ती-संग्राम – भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(राष्ट्रसेविका समितीच्या यावर्षीच्या हस्तलिखितामघ्ये  सुश्री पुष्पा प्रभुदेसाई यांच्या या लेखाची निवड झाल्याबद्दल ई – अभिव्यक्ती समूहातर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन, व पुढील साहित्य-वाटचालीसाठी शुभेच्छा.)  

“शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट” हे गाणं मनावर रुंजी घालत होतं. आणि तेव्हाच ‘स्वातंत्र्याची गाथा’, मला डोळ्यासमोर दिसायला लागली. यावर्षी आपल्या भारतमातेला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होत आहेत. अमृत महोत्सव साजरा होत आहे.गेल्या 75 वर्षांचा लेखाजोखा पहाण्याची आज गरज आहे. स्वातंत्र्यासाठी कित्येकजण आपल्या संसारावरच काय,पण आयुष्यावरही तुळशीपत्र ठेवून मृत्यूला सामोरे गेले आहेत. इंग्रजी सत्ता संपुष्टात आणण्यात यश मिळालं, पण तरीही पूर्णविराम झालाच नव्हता.

1947 पर्यंत 600 पेक्षा अधिक छोटी मोठी संस्थाने भारतात होती. त्यांना मर्यादित स्वायत्तता असली तरी, सार्वभौमत्व ब्रिटिशांचे होते. महात्मा गांधींची भूमिका, स्वातंत्र्याबरोबरच सरंजामशाही संपुष्टात आणून,खऱ्या अर्थाने लोकशाही स्थापन होऊन, अखंड भारत व्हायला हवा, अशी होती. त्यावेळेचे गृहमंत्री श्री वल्लभभाई पटेल यांनी संस्थानिकांशी बोलणे करून, त्यांना पटवून, भारतात विलीन करून घेतले. शेवटी काश्मीर 27 ऑक्टोबर 1947 ला,आणि जुनागढ 20 फेब्रुवारी 1948 ला विलीन झाले. शेवटी राहिले ते हैदराबाद संस्थान. 1900 साली एका करारान्वये,ब्रिटिशांचे संरक्षित राज्य म्हणून दर्जा असलेले हैदराबाद संस्थान, लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे होते. शिवाय दक्षिण- उत्तर भारताच्या मध्ये, म्हणजे भारताच्या ह्रदय स्थानावर असल्याने,  व्यवस्थापनाच्या दृष्टीने अवघड होते. महाराष्ट्र, कर्नाटक, आणि तेलंगणाचे भाग मिळून हे संस्थान होते.तीनही भाषा तेथे बोलल्या जात होत्या. 85 टक्के लोक हिंदू होते. उरलेले मुसलमान, ख्रिश्चन, अशी विभागणी होती. वल्लभभाई पटेल यांची वर्षभर निजामाबरोबर बोलणी चालू होती. पण सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. स्वातंत्र्यप्राप्तीच्यापूर्वीच 11 जून 1947 रोजी निजामाने, ” आपण कोणत्याही संघराज्यात सामील होणार नाही”,अशी घोषणा केली. ‘आपल्या संस्थानाला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळू शकतो ‘, अशी स्वप्ने तो पहात होता. हैदराबादला समुद्रकिनारा नसल्याने, पोर्तुगीजांकडून गोवा आपण विकत घ्यावे व बंदर वापरण्याचे अधिकार मिळवावेत, असे त्याचे प्रयत्न सुरू झाले.

निजाम उल मुल्क म्हणजे जगाचा प्रशासक. ती एक पदवी होती.सात निजामांनी मिळून, दोनशे वर्षे हैदराबादवर राज्य केले. हा शेवटचा निजाम म्हणजे, उस्मान अली खान.जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती !. त्याकाळात त्याची संपत्ती 250 अरब अमेरिकी डॉलर, शिवाय सोने, आणि आभूषणांची भांडार होती.स्वतःला तो अहम समजत होता. राज्यकारभारात अल्पसंख्य मुस्लिमांना प्राधान्य देऊन, हैदराबाद इस्लामी संस्कृतीचे केंद्र बनावे,यादृष्टीने त्याचे प्रयत्न सुरू झाले.

त्या काळात लोकमान्य टिळकांनी शाली बंडा येथे गणेशोत्सवाची सुरुवात केली. आणि पुढे याची व्याप्ती वाढत गेली.त्यामुळे जनतेत चेतना निर्माण झाली. हैदराबादची  जनता भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचा  हा एक भाग समजत होती. राज्यात तिरंगा फडकवता  येत नव्हता. मुल्ला अब्दुल कयूम खानानेही  स्वदेशी आंदोलनात भाग घेतला. इतकेच नाही तर,त्याने गणेशोत्सवालाही पाठिंबा दिला होता. रँड खून खटल्यातील चाफेकर यांना सहा महिने हैदराबादला लोकांनी लपवून ठेवले होते. अखेर निजामाच्या पोलिसांनी त्यांना इंग्रजांच्या स्वाधीन केले. न जुमानणाऱ्या ‘ शौकत उल इस्लाम ’ सारख्या सुधारणावादी वृत्तपत्रांची मुस्कटदाबी सुरू झाली. १८८५ च्या काँग्रेसच्या स्थापनेनंतर, जनमत त्यांच्या बाजूनेच होते.पण निजामाने त्यांच्याविरोधात जायला सुरुवात केली. वृत्तपत्रांवर निर्बंध घातले. प्रत्यक्ष भूभागातील 40 टक्के भाग जमीनदारांचा, आणि 60 टक्के निजामाचा. प्रत्यक्ष कारभार असा होता. बेहिशोबी सारावसुली, वेठबिगारी पद्धती, राबवून घेणं, शेतकऱ्यांकडून सक्तीने कामे करून घेणं, जुलूम जबरदस्ती, कर्जफेड न झाल्यास जमिनी बळकावून त्यांना भूमिहीन करणे, हे प्रकार चालू होते. असह्य होऊन अखेर जनता असंतोषाने पेटली. 1946 मध्येच सरंजामशाही विरोधात चळवळ सुरू झाली.  चितल्या ऐलम्मा या नावाच्या एका कर्तबगार स्त्रीने आंदोलनाला सुरुवात केली. आणि ते नंतर 4000 खेड्यात पसरले. दलित समाजानेही संघटित होऊन चळवळ सुरू केली. जनतेने विलीनीकरणासाठी सशस्त्र आंदोलन व सत्याग्रह करायला सुरुवात केली. स्वामी रामानंद तीर्थ,  गोविंद भाई श्रॉफ, नारायण रेड्डी,बाबासाहेब परांजपे यांच्या नेतृत्वाखाली,जीवाची पर्वा न करता, संग्राम सुरु केला, व संस्थानच्या कानाकोपऱ्यापर्यंत पिंजून काढला. न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हैदराबाद मुक्ती लढ्याचे साक्षेपी अभ्यासक होते.

क्रमशः....

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पेडोंगी ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ पेडोंगी ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

★★★ पेडोंगी (१९६२ – ९८) ★★★

पेडोंगी नाव वाचून आपण बुचकळ्यात पडू. पेडोंगी हे नाव एका खेचराचं आहे. खरे तर माणसांची किंमत नसणाऱ्यांना ह्या खेचराच्या नावाचा गंधही नसेलच. पण ही कोणी साधीसुधी खेचर नाही, तर भारताच्या संरक्षणात आपलं आयुष्य तिने वेचलेलं आहे. भारतीय सेनेचा एक अविभाज्य भाग म्हणजेच खेचरं. सद्यस्थितीला भारतीय सेनेत ६००० पेक्षा जास्ती खेचरं काम करत आहेत. भारताची सरहद्द उत्तरेत हिमालयाच्या उंच शिखरांनी वेढलेली आहे. समुद्रसपाटीपासून १७,००० फुटापर्यंत जाणाऱ्या शिखरांवर भारतीय सैनिक डोळ्यात तेल घालून भारताच्या सरहद्दीचं संरक्षण करतो. भारतीय सेनेच्या अनेक पोस्ट ह्या अश्या ठिकाणी आहेत, ज्या ठिकाणी कोणतंच वाहन आजही जाऊ शकत नाही.  जिकडे स्वतःचा जीव वाचवणं कसरत असते, तिकडे दारुगोळा, रसद आणि इंधन अश्या गोष्टी वाहून नेणं किती कठीण असेल ह्याची आपण कल्पना करू शकतो. ह्याच कठीण काळात भारतीय सेनेच्या मदतीला आजतागायत धावून आली आहेत ती खेचरं. अतिउंचावरील अतिशय थंड आणि विरळ हवेत ही खेचरं काम करू शकतात. अतिशय खडकाळ आणि निसरड्या वाटेवरून मार्गक्रमण करू शकतात.  ह्या पलीकडे खेचरं अतिशय प्रामाणिक असतात. त्यामुळेच आजही भारतीय सेनेचा कणा बनून भारताच्या रक्षणात आपला सहभाग देत आहेत.

पेडोंगीचं खरं सैनिकी नाव होतं Hoof Number 15328. १९६२ साली पेडोंगी भारतीय सैन्यात दाखल झाली. त्या काळात आधुनिक संपर्कप्रणाली आणि प्रगत वाहनं  नसताना भारतीय सैन्याची सगळी दारोमदार खेचरांवर अवलंबून होती. बॉम्बच्या स्फोटात, गोळ्यांच्या वर्षावात, निसर्गाच्या प्रकोपाला न जुमानता पेडोंगी आणि तिच्या सहकाऱ्यांनी भारतीय सैन्याला रसद पुरवण्याचं आपलं काम इमाने इतबारे पार पाडलं. १९७१ साल उजाडलं. भारत- पाकिस्तान युद्ध सुरु झालं. भारतीय सेनेला रसद पुरवताना पेडोंगीला पाकिस्तानी सैन्यानी पकडलं आणि आपल्या पोस्टवर बंदी बनवून, तिला पाकिस्तानी सैन्याला मदत करण्यासाठी जुंपलं. कोण म्हणतं प्राण्यांना भावना नसतात? भारताच्या सरहद्दीच्या रक्षणासाठी आपला जीव धोक्यात टाकणारी पेडोंगी संधी मिळताच पाकिस्तानी सैन्याला गुंगारा देऊन आपल्या पाठीवर असणाऱ्या मिडीयम मशीन गन आणि दोन बॉक्स गोळ्यांसकट निसटली. आपल्या जिवाची पर्वा न करता गोळ्यांच्या वर्षावात जवळपास २५ किलोमीटरचं अंतर कापून (२५ किलोमीटर अंतर १७,००० फुटांवर — पाठीवर एक मशिनगन आणि दोन बॉक्स गोळ्यांचं वजन घेऊन धावणं, ते ही शत्रूच्या प्रदेशात– काय असेल ह्याचा आपण विचारही करू शकत नाही.) भारतीय हद्दीत प्रवेश करून तिने भारतीय पोस्टवर आपली हजेरी नोंदवली.

तिचे आपल्या देशाप्रत असलेले प्रामाणिक  प्रेम बघून भारताच्या त्या पोस्टवरील बटालीयन कमांडरने आपल्या वरिष्ठ ऑफिसरना पेडोंगीच्या पराक्रमाची दखल घेण्याची शिफारस केली. १९८७ ला पेडोंगी भारतीय सेनेच्या 853 AT Company ASC मध्ये काम करत होती. २९ वर्षाची असणारी पेडोंगी सर्वात वयोवृद्ध खेचर होती.  पण त्या वयातही आपल्या पाठीवरचं सामान जवळपास १७,००० फूट उंचीवर वाहून नेत होती. ह्या युनिटचे कमांडिंग ऑफिसर मेजर चुनीलाल शर्मा ह्यांनी पेडोंगीच्या पराक्रमाची नोंद घेताना तिला सामान वाहण्यापासून मुक्त केलं. तिची ऑफिशियल नियुक्ती 53 AT Company ASC कंपनीची (देवदूत) ताईत म्हणून केली. ह्या युनिट च्या १९८९-९० च्या ग्रीटिंग कार्डवरही पेडोंगीला तिच्या सेवेसाठी स्थान दिलं गेलं. ह्याच युनिटसोबत तिची नियुक्ती बरेली, उत्तर प्रदेश इकडे नंतर झाली. इथल्या खूप मोठ्या परिसरात पेडोंगीने आपला काळ आरामात व्यतीत केला.

१९९२ ला पेडोंगीला एका खास कार्यक्रमासाठी दिल्लीला नेण्यात आलं. तिकडे २२३ व्या कॉर्प्स दिवसाच्या कार्यक्रमात पेडोंगीला तिच्या पराक्रमासाठी, देश सेवेसाठी, कर्नल गिरधारी सिंग ह्यांच्या हस्ते मखमली निळ्या घोंगडीने सन्मानित करण्यात आलं. त्याच वेळेस तिला तिचं नावं ‘पेडोंगी’ हे देण्यात आलं. उत्तर सिक्कीममध्ये असलेल्या पेडोंग ह्या युद्धभूमीच्या नावावरून तिचं नामकरण करण्यात आलं. भारतीय सेनेत अतुलनीय शौर्य, सेवा देणाऱ्या घोडयांना आजवर नाव देण्याचा सन्मान मिळालेला होता.  पण पेडोंगी ही पहिली खेचर होती, जिला हा सन्मान देण्यात आला.

 ह्यानंतरचा काळ पेडोंगीने बरेलीतच व्यतीत केला. १९९७ ला पेडोंगीच्या सेवेची नोंद ‘ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ‘ने घेताना “ जगातील कोणत्याही सेनेसाठी सर्वात जास्त कालावधीसाठी सेवा देणारी खेचर “ असं तिचं नाव सुवर्णअक्षरांनी कायमच नोंदवलं. २५ मार्च १९९८ ला पेडोंगीने अतिशय समाधानाने अखेरचा श्वास घेतला आणि एका युगाचा अंत झाला.

असं म्हणतात की खेचराला एकदा रस्ता दाखवला की पुढल्या आख्या आयुष्यात, तो तुम्हाला रस्ता दाखवेल. पण पेडोंगीचा पराक्रम अभूतपूर्व असा होता. आपला शत्रू कोण, मित्र कोण हे ओळखताना संपूर्ण आयुष्य तिने १७,००० फुटांवर भारतीय सरहद्दीचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी वेचलं. ही पण एक प्रकारची देशभक्तीच आहे. कोणी म्हणेल की पेडोंगीला रस्ता माहीत होता म्हणून ती परत आली. पण मग एकटी तीच का? तिच्यासोबत पकडलेली इतर खेचरं  आली नाहीत.  पण ती जिवावर उदार होऊन परत आली. पेडोंगीला आज जाऊन २२ वर्षाचा कालावधी झाला.  पण आपलं जीवन भारतासाठी समर्पित करणारी पेडोंगी भारतीयांच्या मनात आजही उपेक्षित आहे ही एक खंत आहे. तिचा भीमपराक्रम, देशभक्ती, आणि कार्य हे शब्दांपलीकडचं आहे. 

देशासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या पेडोंगीला माझा कडक सॅल्यूट, आणि तिच्या स्मृतीस माझा साष्टांग नमस्कार.

संग्राहक : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मी आहे तुझाच…. ☆ संग्राहक – कालिंदी नवाथे

? इंद्रधनुष्य ?

☆ मी आहे तुझाच….☆ संग्राहक – कालिंदी नवाथे ☆ 

काही वर्षांनी पुन्हा तो आयुष्यात डोकावला,

माझ्याविना आयुष्य कसं वाटतंय ? कानाशी पुटपुटला… ठीक चाललं आहे…. मी म्हटलं 

 

संसाराच्या गाड्यात सहाजिकच तुझं थोडं विस्मरण झालं..

अस्तित्वावर बोट ठेवायला पुन्हा का येणं केलंस ?

 

रोजच्या धावपळीत स्वतःलाच विसरले होते..

चाकोरीत फिरताना नकळत  तुझे बोट सोडले होते..

 

शाळा कॉलेजमध्ये तू सोबत होतास म्हणून

अशक्य ते शक्य झालं,

मेहनतीने का असेना यशाचं शिखर गाठता आलं…

 

आता संसारात सगळ्यांसाठी तडजोड करावी लागते, कधी मनही मारावं लागतं…

एवढं करूनही हिला काही येत नाही असं त्यांना वाटतं…

 

दोन पुस्तकं शिकून मुलं शहाणी होतात..

पहिला गुरु आई,

हेच नेमकं विसरतात..

 

नवऱ्याच्या पाठीशी बायको

खंबीरपणे उभी रहाते,

पण कौतुक सोडून,

‘वेंधळीच आहेस बघ’ हेच ऐकायची सवय होते…

 

मी मात्र मागे राहिले..

स्वतःसाठीचं जगायचं विसरले…

मित्रा आता घे परत हातात हात, पूर्वीसारखी असू दे तुझी कायम साथ..

 

तो म्हणाला, मिळवण्यासाठी मला कणखर व्हावं लागतं,

नवा दिवस उगवण्यासाठी तर पृथ्वीलाच सूर्याभोवती फिरावं लागतं…

 

हसून विचारलं त्याला आहेस कोण एवढा खास ?

तो ही हसला.. म्हणाला,

ओळखलं नाहीस अजून..?

मी आहे तुझाच….

आत्मविश्वास

संग्राहक :– कालिंदी नवाथे 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मावशी नावाचे सुख ☆ संग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

?इंद्रधनुष्य?

मावशी नावाचे सुख ☆ संग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

मावशी बरोबरचं नातं खरंच खूप छान असतं . हे नातं भावनिक पातळीवर खूप आनंद देणारं असतं.

मावशी भरभरून प्रेम देते…

आपल्या जन्माआधीच, म्हणजे अगदी आपण आईच्या पोटात असतानाच मावशीची आणि आपली एक वेगळीच अदृश्य नाळ जोडलेली असते…

आपल्या जन्माने तिला झालेला आनंद अवर्णनीय असतो.

खरंच मावशी नेमकी कोण असते हो ???

आई नसताना तुमच्यासाठी तुमची हक्काची माया देणारी ,

मावशी.. ही तुमची प्रेमळ हाक ऐकताच तुम्हाला भरभरून प्रेम देणारी…

आपल्या आवडीचं , लपवून ठेवलेलं  खाऊ घालणारी…

आपल्या लहानपणाची साक्षीदार , आपल्या लहानपणीच्या आठवणी तिच्याशिवाय पूर्ण होत नाहीत…

तिचं वाढणारं वय आणि त्यामुळे वाढणार्‍या जबाबदार्‍या आपल्याला तिच्यापासून दूर करतात , पण ते तुम्हाला आवडलेलं नसतं , तुमच्याही नकळत…

‘तू अगदी तुझ्या मावशी वर गेलायेस’… असं कोणी म्हटलं तर एक वेगळंच स्मित हसू आपल्या चेहर्‍यावर उमटतं…

अगदी आजही मावशीसाठी आपण कोण असतो ???

आपल्या जन्मापूर्वीपर्यंत तिला कदाचित लहान मुलं अजिबात आवडत नसावीत…!!!

पण , तरीही तुम्हाला पहिल्यावर तिच्या पोटात मायेचे झरे लोटतातच कसे ??? का कुणास ठाऊक…!!!

आपल्या लहानपणी तुमची केअरटेकर , तुमच्या आईची हक्काची असिस्टंट अशा जबाबदार्‍या तिने यथार्थ पार पाडलेल्या असतात…

आपल्यासाठी एखादं म्हणून गिफ्ट घ्यायला ती जाते … आणि  प्रत्यक्षात … जे जे आवडेल ते ते तुमच्यासाठी ती घेऊन येते , अगदी सहज…

तुमची आवडनिवड मनापासून जपते अन् दर वाढदिवसाला काहीतरी तुमच्यासाठी स्पेशल गिफ्ट देते…

सर्वात महत्वाचं म्हणजे… तुमच्याप्रती तिची माया आटतंच नाही, तिचे स्वतःचे मूल  झाल्यावरही…

आईएवढेच तुमचे लाड करणारी , कशाचीही अपेक्षा न ठेवणारी , तुमच्या आई-वडिलांची ती सावली असते…

 

संग्राहक : – सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डालडा…भाग 2 ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

?इंद्रधनुष्य? 

☆ डालडा…भाग 2 ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

( भारतात आल्यावर टाटा ऑईल मिल्स येथे कंपनीचे डायरेक्टर कपिलराम वकील यांचे मुख्य मदतनीस म्हणून ते नोकरी करू लागले.) इथून पुढे —–

डालड्याचा शोध एका मराठी माणसाने लावला होता.

पहिल्या महायुद्धाचा हा काळ होता. सैनिकांना  लोण्याची आवश्यकता असायची. पण ते सर्वाना पुरेसं मिळणं  शक्य नव्हतं. थिजवलेल्या तेलापासून लोण्याचा स्वस्त पर्याय म्हणून सैन्यात मार्गारीन वापरायला लागले. ते लोकप्रिय झाले व ते स्वस्त असल्यामुळे मागणी वाढत गेली.

पण भारतीय सैनिकांकडून मात्र या मार्गारीनपेक्षा तुपाची मागणी जास्त व्हायची.

याच काळात जगभरातील संशोधक साजूक तुपाला पर्याय शोधण्याच्या मागे लागले होते.  विशेषतः अमेरिका व जपान मध्ये गोडेतेलापासून तूप तयार करण्याचे प्रयत्न सुरू होते, पण त्यांना यश मिळत नव्हते. पण टाटा कंपनीमध्ये नारायणराव भागवत आणि कपिलराम या दोघांनी त्यात यश मिळवले.

पहिले नैसर्गिक तूप भारतात तयार झाले.

ही गोष्ट टाटा कंपनीचे वित्तीय सल्लागार असलेल्या पिटरसन या गोऱ्या अधिका-याला कळली. त्याने या कृतीची मागणी त्यांच्याकडे केली. पण भागवत आणि कपिलराम उत्तरले, ‘‘या क्षेत्रात आम्ही शोधकर्ते ठरलो आहोत, तर मग त्याचा फायदा आमच्या देशालाच झाला पाहिजे. आमच्या देशालाच त्याचे श्रेय मिळायला हवे ’’.

इंग्रजांच्या सत्तेचा काळ होता. आपण ज्यांच्यावर राज्य करतो ते भारतीय लोक आपली आज्ञा मानत नाहीत याचा राग त्या पिटरसनच्या मनात आला. त्याने थेट टाटांच्या या कंपनीची आर्थिक नाकेबंदी केली. टाटांना ही कंपनी बंद करावी लागली.

कपिलराम आणि नारायणराव दोघेही बेकार झाले. जवळपास सात वर्ष नारायणराव बेकार होते. अमेरिकेतील एक अतिशय चांगल्या पगाराची नोकरी त्यांना चालून आली होती.  पण ‘ वनस्पती तुपाच्या’ शोधाचे श्रेय आपल्या देशालाच द्यायचे ‘ या हट्टापायी त्यांनी ती नाकारली.

या  काळात त्यांच्या एका बहिणीने आपल्या शिक्षिकेच्या नोकरीतून त्यांच अख्खं कुटुंब संभाळलं.

अखेर सात वर्षानी कपिलराम यांनी गुजरातमध्ये सॉल्ट कंपनी सुरु केली व नारायणरावांना तिथे नोकरी मिळाली. या दोघांच्या जोडीने तिथेही रसायनशास्त्रात अनेक महत्त्वाचे शोध लावले. पुढे ही कपिलराम यांची कंपनी टाटांनी विकत घेतली आणि तिचं नांव ठेवलं—” टाटा केमिकल्स “ .

टाटा केमिकल्सची मुख्य जबाबदारी कपिलराम आणि नारायणराव यांच्याकडेच होती.

सर्व घडी नीट बसलेली असतानाच अचानक नारायणरावांना गुजरात सोडून परत यावं लागलं. त्याच्या वडिलांना पॅरालिसीसचा झटका आला होता. मुंबईत येऊन त्यांनी आपले मित्र अनंतराव पटवर्धन यांच्याबरोबर साबण आणि बाकीच्या कंपन्यांना लागणारी केमिकल्स बनवणारी ‘ अनार अँड कंपनी ’ सुरू केली.

याच काळात लिव्हर ब्रदर्सनी भारतात ‘ हिंदुस्तान वनस्पती मॅन्युफॕक्चरिंग ‘ नांवाची कंपनी स्थापन केली होती.

त्यांनी डाडा या डच कंपनीबरोबर करार केला आणि भारतात सेवर येथे वनस्पती तूप बनवणारी फॅक्टरी सुरु केली. हे वर्ष होतं १९३७. पुढे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांना संपूर्ण जगभरात वनस्पती तूप पाठवण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आणि तिथून वनस्पती तूप म्हणजे डालडा हा अगदी समानार्थी शब्द पडून गेला,

वनस्पती तुपाचा शोध प्रत्यक्षात नारायणराव भागवत यांनी लावला होता हे जगाबरोबरच आपणही विसरून गेलो,  हे आपले दुर्भाग्य होय. 

नारायणराव भागवतांच्या मुलींनीही त्यांच्या घरची उच्च शिक्षणाची परंपरा पुढे नेली. त्यांच्या दोन्ही मुली म्हणजे सुप्रसिद्ध लेखिका आणि समाजसेविका दुर्गा भागवत, आणि भारतातल्या पहिल्या डॉक्टरेट मिळवणाऱ्या कमलाबाई भागवत सोहनी. त्यांच्या रूपाने भागवत कुटुंबाचं नाव अजरामर राहिले आहे.

समाप्त

संदर्भ : विज्ञान विशारद, लेखिका – वसुमती धुरू – ग्रंथाली प्रकाशन.

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डालडा…भाग 1 ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

?इंद्रधनुष्य? 

☆ डालडा…भाग 1 ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

डालड्याचा शोध एका मराठी माणसाने लावला होता.

डालडा सगळ्यांनाच माहित आहे. एकेकाळी हे पिवळे डब्बे प्रत्येकाच्या घरात दिसायचे. साजूक तुपाचा सब्स्टिट्यूट असलेला हा डालडा–त्याचा तो डबाही मोकळा झाल्यावर भरपूर कामांसाठी उपयोगी पडायचा. तो आपल्या जेवणाशी आणि जीवनाशी एवढा जोडला गेला होता, की डालडा हा एक ब्रँड आहे आणि पदार्थाचं  नाव वनस्पती तूप आहे हे आपण विसरूनच गेलो होतो.

हो वनस्पती तूप– एकेकाळी याच वनस्पती तुपाने संपूर्ण दुसऱ्या महायुद्धात सैनिकांना जगवलं होतं. पण गंमत अशी की आपल्यापैकी प्रत्येकाला वाटतं  की हे वनस्पती तूप परदेशात शोधलं गेलंय. तर तसं  नाही. या वनस्पती तुपाचा शोध एका मराठी माणसाने लावला आहे.

नारायणराव बाळाजी भागवत हे त्या माणसाचे नाव. 

भागवत घराणे हे मूळचे पंढरपूरचे. घरात अगदी गर्भश्रीमंती होती. पण नारायणरावांचे वडील त्यांच्या वडिलांशी भांडून निराधार अवस्थेत मुंबईस आले. तिथेच हमाली वगैरे करून शिक्षण घेतलं.  मॅट्रिकच्या परीक्षेत  त्यांना मानाची  “जगन्नाथ शंकरशेठ” शिष्यवृत्ती मिळाली. आपल्या मेहनतीने शिक्षण पूर्ण करून ते वकील झाले. नंतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. नंतर बाळाजी भागवत इंदोरच्या होळकर संस्थानचे दिवाण बनले.

बाळाजी भागवतांची पत्नी ही त्या काळातली, म्हणजे एकोणिसाव्या शतकातली मॅट्रिक होती, आणि इंग्रजी पुस्तके वाचणे हा तिचा छंद होता.

अशा सुशिक्षित माता-पित्यांच्या पोटी १८८६ मध्ये नारायणरावांचा जन्म झाला. नारायणराव व त्यांची भावंडे अभ्यासात हुशार होती. नारायणरावांनादेखील  आपल्या वडिलांच्याप्रमाणे “जगन्नाथ शंकरशेठ” स्कॉलरशिप मिळवायची होती. त्यासाठी ते संस्कृत भाषेचा अभ्यास फार जोमाने करत होते. पण त्यांच्याच एका आप्ताने त्यांना सांगितले, “ नारायणा, तुझी आर्थिक स्थिती उत्तम आहे, तुझे शिक्षण तुझे आई-वडील सहज करू शकतात. त्यामुळे उगीचच जगन्नाथ शंकरशेठ मिळवून तू दुस-या एका हुशार पण गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण पैशाअभावी अडवू नकोस. आणि जो काही अभ्यास करशील तो आनंदासाठी कर, काही मिळवायचे असे ध्येय ठरवून करू नकोस. “

हा सल्ला नारायणरावांना जन्मभर मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरला. नारायणराव भागवतांनी मुंबईच्या झेवियर्स कॉलेजमधून  रसायनशास्त्रात डिग्री घेतली. याच काळात सर जमशेदजी टाटांच्या संकल्पनेतून कर्नाटकातील बेंगलोरमध्ये “ इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स ”ची स्थापना झाली होती.

भारतातील हे पहिले मूलभूत संशोधन केंद्र होते. नारायणरावांनी तिथल्या पहिल्याच बॅचमध्ये प्रवेश घेतला. रसायनशास्त्रात त्यांनी ऑईल्स आणि फॅट्स यावर संशोधन केले.

ते टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सची संशोधन पदवी पूर्ण करणारे पहिले विद्यार्थी ठरले. त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या भावाने देखील याच संस्थेत प्रवेश घेतला.

पास आउट झाल्यावर नारायणराव येमेन देशातील एडनला गेले. तिथे त्यांच्या वडिलांच्या मित्राचा,  इब्राहिमभाई लालजी यांचा, साबणाचा कारखाना होता. त्यांनी तिथे त्यांना मदत करण्यास सुरवात केली. त्यांच्याच घरात त्यांच्या मुलासारखे राहिले.

पुढे १९१९ मध्ये पत्नीचे निधन झाल्यावर ते भारतात परत आले. भारतात आल्यावर टाटा ऑईल मिल्स येथे कंपनीचे डायरेक्टर कपिलराम वकील यांचे मुख्य मदतनीस म्हणून ते नोकरी करू लागले.

क्रमशः….. 

संदर्भ : विज्ञान विशारद, लेखिका – वसुमती धुरू – ग्रंथाली प्रकाशन.

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ खिलाडू वृत्ती जिथे गगनाला गवसणी घालते. ☆ संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ

? इंद्रधनुष्य ? 

☆ खिलाडू वृत्ती जिथे गगनाला गवसणी घालते ☆ संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ☆ 

टोकियो ऑलिंपिकच्या पुरुषांच्या उंच उडी प्रकारातील स्पर्धा शेवटच्या टप्प्यात शिगेला पोहोचली होती…इटलीचा Gianmarco Tanberi व कतारचा Murtaz Essa Barshim हे दोघे, अटीतटीच्या प्रयत्नाने सुवर्णपदक जिंकायचेच या ईर्ष्येने जीवाची बाजी पणाला लावत होते…प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. दोघांनी २.३७ मीटर उंचीचा टप्पा बरोबरीनेच कसाबसा, आटोकाट प्रयत्नांती ओलांडला होता. आता प्रत्येकाला पुढील टप्पा तीन प्रयत्नात ओलांडायचा होता…पण दोघेही तो टप्पा तीन प्रयत्नांतीही  ओलांडण्यात अपयशी ठरले. आता ही कोंडी कशी फुटणार ? मोठा गहन प्रश्न उभा ठाकला. ऑलिंपिक अधिकाऱ्यांनी दोघांना आणखी एक संधी देऊन हा पेचप्रसंग सोडवण्याचे ठरवले. पण यापूर्वीच तीन प्रयत्नादरम्यान इटलीच्या खेळाडूच्या- Gianmarco Tanberi च्या पायाला गंभीर दुखापत झाली होती व नाईलाजाने शेवटची संधी घेण्यास आपण असमर्थ असल्याचे सांगत त्याने स्पर्धेतून माघार घेतली. याचा अर्थ कतारचा खेळाडू Murtaz Barshim यास विजयी घोषित करून त्यास सुवर्णपदक दिले जाईल, याची त्याला कल्पना होती. पण त्याचा नाईलाज होता…‌आणि येथे खिलाडूवृत्तीचे विस्मयकारी दर्शन Murtaz Barshim ने दाखवले. त्याने जास्तीचा एक प्रयत्न आजमावून पाहण्याचीही गरज नव्हती. तो गप्प बसला असता तरीही त्यास सुवर्ण पदक मिळाल्याचे घोषित झाले असते. पण त्याने उमदेपणा दाखवित, “मी सुद्धा माघार घेतली तर आम्हा दोघांनाही सुवर्णपदक विभागून दिल्याचे घोषित केले जाईल का? “, अशी पृच्छा ऑलिंपिक अधिकाऱ्यांकडे केली. त्यांनी विचारविमर्श करून —

‘दोघांनाही ते पदक विभागून मिळेल ‘ असे कळवले..‌‌.कतारच्या खेळाडूने आपली पण माघारी घोषित केली व इटलीच्या खेळाडूला गगन ठेंगणे झाले ! आणि कतारच्या खेळाडूने- Murtaz Barshim नेही सुवर्णपदक न चुकवता ही सर्वोच्च कोटीची खिलाडूवृत्ती आपण दाखवू शकलो, या आनंदाने आपल्या प्रतिस्पर्ध्याला मिठी मारली !

पात्रता नसतांनाही स्वयंघोषित सन्मान मिरवणारे ‘ वीर’ कुठे आणि सन्मानाचा हव्यास न दाखवणारे हे ऑलिंपियन कुठे ? बडा जिगरा चाहिए उमदेपणासाठी !

संग्रहिका : सुश्री लता गाडगीळ

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print