मराठी साहित्य – काव्यानंद ☆ मानुष हौं तो वही रसखानि – भाग १ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

महत्वाचे निवेदन

काव्यानंद  या सदरात मराठी भाषेतील  कवितेचे रसग्रहण  अपेक्षित  आहे.आज आम्ही अपवादात्मक  बाब म्हणून  हिंदी भाषेतील काव्य रचनेचे रसग्रहण  प्रकाशित  करीत आहोत.आपला अंक तिनही भाषेत प्रकाशित होत असल्यामुळे त्या त्या भाषेतील साहित्य  प्रकाशित होईल.यापुढील काळात मराठी अंकासाठी अन्य भाषेतील साहित्य  पाठवले जाणार नाही याची कृपया दक्षता घ्यावी, ही विनंती.

संपादक  मंडळ (ई-अभिव्यक्ती -मराठी)

? काव्यानंद ?

☆ मानुष हौं तो वही रसखानि – भाग १ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव

कृष्णभक्त रसखान यांच्या ‘सवैये’चा काव्यानुभव

प्रसिद्ध कृष्णभक्त रसखान हे ब्रज भाषेचे कवी! वल्लभाचार्यांपासून सुरु झालेला संप्रदाय म्हणजे वल्लभ संप्रदाय. जेव्हापासून गोकुळ हे वल्लभ संप्रदायाचे केंद्र बनले, तेव्हापासून ब्रजभाषेत कृष्णावरील साहित्य लिहिण्यास सुरुवात झाली. या प्रभावामुळे ब्रजची बोली भाषा (मथुरा, गोकुळ व वृंदावन येथील) एक प्रतिष्ठित साहित्यिक भाषा बनली. सूरदास आणि रसखान यांच्या कृष्णभक्तीने रसरसलेले मधुर ब्रज भाषेतील काव्यप्रकार अतिशय सुंदर भावानुभव देतात. ‘कृष्णलीला’ हा त्यांच्या काव्याचा प्रमुख विषय. त्याची खोली अनुभवायची तर रसखान यांचे काव्यवाचन हाच एकमेव उपाय. त्यातीलच भक्तिप्रेम रसाने परिपूर्ण अशा त्यांच्या कांही प्रसिद्ध ‘सवैये’ या काव्यप्रकाराचा या लेखात समावेश करीत त्यांचे रसग्रहण करण्याचा मी प्रयत्न केला आहे.         

सय्यद इब्राहिम खान उर्फ रसखान यांचा जन्म काबुल येथे (१५७८) झाला तर मृत्यू वृंदावन येथे झाला (१६२८). ते प्रसिद्ध भारतीय सुफी कवी आणि कृष्णाचे परम भक्त होते! आपण बादशाही वंशातील आहोत, असा कवीने स्वतःचा उल्लेख केला आहे. त्यावरून त्यांचे बालपण चांगल्या स्थितीत गेले असावे, असे समजल्या जाते. भागवताचा फारसी अनुवाद वाचून त्यांच्या हृदयात श्रीकृष्णाबद्दल भक्ती उत्पन्न झाली. या संदर्भात अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. शेवटी तात्पर्य इतकेच, की त्यांना अनेक प्रसंगामुळे कृष्णभक्तीची ओढ लागली. वल्लभाचार्यांचे पुत्र विठ्ठलनाथ यांनी कृष्णभक्तीची दीक्षा दिल्यानंतर मुसलमान असूनही त्यांनी वैष्णव भक्ताप्रमाणे जीवन व्यतीत केले. 

त्यांनी प्रेमवाटिका हे काव्य १६ व्या शतकात रचले आणि ते वृंदावन येथे खूपच प्रसिद्ध झाले. बावन दोह्यांच्या या काव्यात प्रेमाची महती वर्णिली आहे. ‘सुजान रसखान’ या केवळ १२९ स्फुट पदांच्या संग्रहाचा नायक आहे ‘सुजान रसखान’ चा प्रिय, आपल्या मुरलीने गोपींना मोहित करणारा श्रीकृष्ण! यातील ‘कवित्तसवैय्ये’ अतिशय लोकप्रिय आहेत. ‘ऐकवा एखादी कविता’ या अर्थी ‘सुनाओ कोई रसखान’ असा वाक्यप्रयोगच या संदर्भात केला जात असे.  ब्रजभाषेत कविता रचणाऱ्या या कवीचा भागवत आणि अन्य संस्कृत ग्रंथांशी चांगलाच परिचय होता असे दिसून आले आहे. आपल्या काव्यात रसखान यांनी या पौराणिक संदर्भांचे उल्लेख केलेले आहेत. त्याच्या कवितेत अरबी, फारसी आणि अपभ्रंश भाषांतील शब्दांचाही विपुल वापर आढळून येतो. त्यांची भाषा साधी व सरळ असूनही सरस आणि समृद्ध आहे. त्यांनी दोहा, कवित्त, घनाक्षरी व सवैय्या छंदांचा (वृत्त) वापर अधिक प्रमाणात केला. आपल्या रचनांतून कृष्णाचे बालपण, त्याच्या विविध लीलांचे रसपूर्ण मनोज्ञ घडवणारा कवी हाच रसखान यांचा सर्वात महान परिचय! काही जाणकारांच्या मतानुसार रसखान यांचे काव्य इतके ‘रसमय’ आहे की ते त्यांना सूरदास या प्रसिद्ध कृष्णभक्त कवीच्याच श्रेणीत नेऊन ठेवतात.

क्रमशः…

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

दिनांक १५ ऑगस्ट २०२3

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ वेडा कलाकार… कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ. ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

वेडा कलाकार कवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे  

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

जगाचे काही नियम असतात. काही विशिष्ट शिष्टाचार, विचारांच्या चौकटी असतात. या चौकटीतच सर्वसामान्य माणूस वावरत असतो, समाजमान्य होईल असे वागत असतो. या चौकटींच्या पलीकडे जात स्वतःच्या मनाप्रमाणे, स्वतःच्या आनंदासाठी जगणाऱ्याला ‘कलंदर’ म्हणतात. ” त्याचं सगळं जगावेगळंच असतं ” असा ठपकाही त्याच्यावर येतो. अशाच एका मनस्वी कलाकाराचे मनोगत म्हणजे डॉ. निशिकांत श्रोत्री लिखित ‘ वेडा कलाकार ‘ ही कविता. आज आपण तिचा रसास्वाद घेणार आहोत.

वेडा कलाकार कवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆

आहे कलंदर, एक कलाकार

कवी मनस्वी, मनाचा दिलदार

 

नाही जमलं तोलायला कधी

घेतलेलं व्रत चांदीच्या तराजूतून

शब्द, सूर, रंग, इतकंच काय

माणसाचं आयुष्य देखील मापायचं असतं

सोन्याच्या मापाने

कधी उमगलंच नाही मला

 

श्रीखंड चाटलं, जामून खाल्ला

भुरके घेतले बासुंदीचे मनसोक्त

अगदी मनमुराद आस्वाद घेतला भेळेचाही

त्यांच्या चवीतच रमून गेलो

पर्वा नव्हती खातोय कसल्या चमच्याने याची

कधी बोट, कधी द्रोण तर कधी पुठ्ठ्याचे तुकडेसुद्धा

 

अन् अचानक अनपेक्षितपणे मिळाला

हातात एक सोन्याचा चमचा

हरखून गेलो, मोहून गेलो

तोंडात घालतांना एकेक घास

काय खातोय जाण नव्हती

सोन्याच्या चमच्यानी खातोय

हीच धुंदी होती

 

धुंदी वाढतच होती

पण पोट भरल्याचं काही जाणवत नव्हतं

का?

लक्षात आलं

तोंडात न श्रीखंड, न बासुंदी, न भेळ

नुसता चमचाच चघळतोय

….. सोन्याचा …..

©️ डाॅ. निशिकान्त श्रोत्री

९८९०११७७५४

आहे कलंदर, एक कलाकार

कवी मनस्वी, मनाचा दिलदार

मी एक कलाकार आहे. कवी आहे. मनाने खूप दिलदार आहे.पण मी कलंदर म्हणा, मनस्वी म्हणा, म्हणजे अगदी बिनधास्त जगणारा, स्वतःच्या आनंदासाठी जगणारा स्वाभिमानी, समाधानी माणूस आहे.

ही कविता प्रथम पुरूषी एकवचनात लिहिली आहे हे याचे खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळे कवी आपले मनोगत सरळपणे, प्रांजळपणे मांडतो.

नाही जमलं तोलायला कधी

घेतलेलं व्रत चांदीच्या तराजूतून

शब्द, सूर, रंग, इतकच काय

माणसाचं आयुष्य देखील मापायचं असतं

सोन्याच्या मापाने

कधी उमगलंच नाही मला

मुक्तछंदातली ही कविता संपूर्णपणे रूपकात्मक आहे. चांदीचा तराजू आणि सोन्याचे माप ही इथे रूपके आहेत. कवी म्हणतो, ” एखादे व्रत घेतल्यासारखे मी माझ्या मनाप्रमाणे जगताना फक्त समाधान मिळविले कोणत्याही गोष्टींपासून तोटा काय आहे फायदा किती आहे याचा कधी विचारच केला नाही. म्हणजे त्या गोष्टींना चांदीच्या तराजूत तोलले नाही. त्यातून मिळालेले समाधान हीच माझी मिळकत आहे.

जग खूप व्यवहारी आहे. लोकांचे यशाचे मापदंड वेगळे आहेत‌. त्यामुळेच साहित्य, संगीत, चित्रकला यासारख्या गोष्टींचेच फक्त नव्हे तर अगदी माणसांचे पण मोजमाप केले जाते, तेही सोन्याच्या मापाने. म्हणजे सगळे काही पैशातच मोजले जाते. हा व्यवहार मला कधी जमलाच नाही, समजलाच नाही. कारण मला पैशांपेक्षा या गोष्टीतून मिळणारे समाधान खूप मोलाचे वाटते.”

कवीच्या या मनस्वी वागण्याने जगाने छांदिष्ट, विक्षिप्त अगदी वेडा अशी विशेषणे त्याला दिली. पण कवीने कधी त्याची फिकीर केली नाही.

श्रीखंड चाटलं, जामून खाल्ला

भुरके घेतले बासुंदीचे मनसोक्त

अगदी मनमुराद आस्वाद घेतला भेळेचाही 

त्यांच्या चवीतच रमून गेलो

पर्वा नव्हती खातोय कसल्या चमच्याने याची

कधी बोट, कधी द्रोण तर कधी पुठ्ठ्याचे

तुकडे सुद्धा

मी प्रत्येक गोष्ट आनंदासाठी, समाधानासाठीच केल्याने अनेक सुखाचे, यशाचे, आनंदाचे चांगले अनुभव घेतले. असे क्षण मनापासून अनुभवले. त्यामध्ये अगदी मनापासून रममाण झालो. यामध्ये मला समाधान मिळवणे हे साध्यच खूप महत्त्वाचे होते. ते मिळवण्यासाठी कोणत्या साधनांचा, कोणत्या गोष्टींचा वापर केला याला माझ्या दृष्टीने फारसे महत्त्व नव्हते.

इथे पक्वान्ने, भेळ, द्रोण, पुठ्ठ्याचा तुकडा ही रूपकेच आहेत. कवीने आपली मनोधारणा जपताना, त्याप्रमाणेच वागताना कधी अगदी श्रीखंड, गुलाबजाम, बासुंदी ही मिष्ठान्ने तर कधी अगदी चटकदार भेळेचाही आस्वाद घेतला. म्हणजे आपल्या जगण्यातून भरपूर आनंद,सुखाचे क्षण, अतीव समाधान मिळवले. त्याच वेळी त्यासाठी काय काय करावे लागले, किती कष्ट करावे लागले, कोणत्या मार्गांचा अवलंब करावा लागला याची कधी पर्वा केली नाही. म्हणजे या पक्वान्नांच्या आस्वादासाठी चमचा, बोट, द्रोण, अगदी पुठ्ठ्याचा तुकडाही कधी वापर करावा लागला तरी त्याची फिकीर केली नाही. फक्त पदार्थांचा आस्वाद घेणे हीच गोष्ट महत्त्वाची होती. त्यामुळे त्यासाठीची साधने गौण मानली.

अन अचानक अनपेक्षितपणे मिळाला

हातात एक सोन्याचा चमचा

हरकून गेलो, मोहून गेलो

तोंडात घालताना एकेक घास

काय खातोय जाण नव्हती

सोन्याच्या चमच्याने खातोय

हीच धुंदी होती

मी आयुष्यात पक्वांन्नांचा आस्वाद मनसोक्तपणे घेतला. तेव्हा ते खायला कोणत्या साधनांचा वापर केला याला फारसे महत्त्व दिले नाही. तर आस्वाद घेणे हेच उद्दिष्ट होते. पण अचानकपणे ध्यानीमनी नसताना मला सोन्याचा चमचा मिळाला. त्यामुळे मी अगदी हरखून गेलो. मती गुंग झाली. त्या नादात आता काय खातोय याचे भानही मला नव्हते. फक्त सोन्याच्या चमच्याने खातोय याचीच धुंदी मला चढली होती.

इथे सोन्याचा चमचा हे खूपच महत्त्वाचे रूपक आहे. ते म्हणजे लक्ष्मीचे वरदान, भरपूर कमावण्याचा मार्ग. हे आजच्या वास्तवाचे, प्रगतीचे रूपक आहे.आजकाल अगदी भरपूर पगाराच्या नोकऱ्या मिळतात. सांपत्तिक स्थिती खूप सुधारते. त्या पैशांचा मोहपाश आवळत जातो. काम-काळ-वेळेचे गणित चुकत जाते. पैसा भरपूर कमावतात. पण त्याचा आस्वाद घ्यायला हाताशी सवड नसते. म्हणजेच हातात सोन्याचा चमचा आहे पण त्याच्या धुंदीपायी आपण काय खातोय हेच समजतही नाही. फक्त खाणे होते अन् अनुभूती शून्य.

धुंदी वाढतच होती

पण पोट भरल्याचं काही जाणवत नव्हतं

का ?

लक्षात आलं

तोंडात न श्रीखंड, न बासुंदी, न भेळ

नुसता चमचा चघळतोय

………सोन्याचा………

ही धुंदी अशी वाढतच होती. पण पोट भरल्याचं मला जाणवत नव्हतं. असं का होतंय ? असा विचार केला आणि माझ्या लक्षात आलं की, माझ्या तोंडात ना पक्वान्न आहे ना भेळ. तर मी नुसताच चमचा चघळतोय. तोही सोन्याचा चमचा.

                            इथे कवितेचा क्लायमॅक्स आहे. पैसा मिळवणे आणि पैशाचा मोह, हव्यास या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अती पैशाने संवेदना बोथट होतात. एक प्रकारची पैशाची धुंदी मनाला ग्रासून टाकते. त्यामुळे पैशाचा आनंद घेणे, उपभोग घेणे, त्यातून मन:स्वास्थ्य मिळवणे या गोष्टी होतच नाहीत. आपण फक्त त्या पैशाच्या हातातले खेळणे बनून त्याच्या मागे धावत राहतो. म्हणजेच तो सोन्याचा चमचा नुसताच चघळत रहातो आणि पोट काही भरत नाही.

                             या कवितेत कवीने रूपकांचा फार  सुंदर वापर केला आहे. चांदीचा तराजू, सोन्याचे माप, श्रीखंड, जामुन, बासुंदी, भेळ, बोट, द्रोण, पुठ्ठ्याचा तुकडा, सोन्याचा चमचा या रूपकां मधून कवींने आजकालच्या जीवन पद्धतीचे फार अचूक वर्णन केलेले आहे. रूपकांमुळे कमीत कमी शब्दात सखोल वर्णन केले गेलेले आहे. जगण्यासाठी नेमके किती हवे, त्यातून मिळणारे समाधान जपायचे का पैशाची हाव धरून त्यामागे धावायचे आणि मग त्यापायी जगायचेच राहून जाते हे भीषण वास्तव आहे.

                            असे हे एका मनस्वी, कलंदर कलाकाराचे मनोगत सांगताना त्यातून कवीने फार मोठा संदेश दिला आहे. तो म्हणजे पैसा मिळवणे हे जितके महत्त्वाचे आहे त्यापेक्षा त्या पैशाचा  योग्य उपभोग घेणे महत्त्वाचे आहे‌. त्यातून मिळणारे समाधान हे खरे लाखमोलाचे असते. आपल्या कृती-उक्तीतून मिळणारे समाधान हेच आपले खरे वैभव असते हीच गोष्ट कवी डॉ. निशिकांत श्रोत्री यांच्या ‘वेडा कलाकार ‘या कवितेतून आपल्याला सांगतात.

 

ज्योत्स्ना तानवडे. पुणे

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ अखिल हिंदु विजयध्वज गीत…. स्व. वि. दा. सावरकर ☆ रसास्वाद – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆  अखिल हिंदु विजयध्वज गीत… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

☆  अखिल हिंदु विजयध्वज गीत…. स्व. वि. दा. सावरकर ☆

अखिल – हिंदु – विजय – ध्वज हा उभवुया पुन्हा ॥ध्रु॥

या ध्वजासची त्या काली । रोविती पराक्रमशाली

 

रामचंद्र लंकेवरती । वधुनि रावणा ॥१॥

करित जैं सिकंदर स्वारी । चंद्रगुप्त ग्रीकां मारी

हिंदुकुश – शिखरी चढला । जिंकुनि रणा ॥२॥

रक्षणी ध्वजाला ह्याची । शालीवाहनाने साची

 

 

उडविली शकांची शकले । समरि त्या क्षणा ॥३॥

हाणिले हुसकिता जेथे । हूणांसि विक्रमादित्ये

हाच घुमवि मंदसरच्या । त्या रणांगणा ॥४॥

 

जइं जइं हिंदू सम्राटे । अश्वमेध केले मोठे

करित पुढती गेला हाचि । विजय घोषणा ॥५॥

 

उगवुनि सूड हिंदूंचा । मद मर्दुनि मुस्लीमांचा

शिवराय रायगडी करिती । वीरपूजना ॥६॥

 

ध्वज हाच धरुनि दिल्लीला । वीरबाहु भाऊ गेला

मुसलमीन तख्ता फोडी । हाणुनि घणा॥७॥

 

पुढती नेम कांही ढळला । ध्वज जरी करातुन गळला

उचलुया पुनरपि प्राणा । लावुनि पणा ॥८॥

(आंग्ल दैत्य तोचि आला । सिंधुतूनि घालुनि घाला

बुडविला सिंधुतचि त्याही । करुनि कंदना ॥८॥)

–  कवी – वि. दा. सावरकर

☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

भारत पारतंत्र्यात असताना १९३८ साली सावरकरांनी ही कविता लिहिली होती. त्यावेळी त्या कवितेत पहिली आठ कडवी होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५१ साली या कवितेतलं आठवं कडवं बदलून, त्याजागी सावरकरांनी वर कंसात दिलेलं आठवं कडवं जोडलं.

या देशातल्या पौराणिक  व ऐतिहासिक वीरांनी परकीय आक्रमणाला कसं तोंड दिलं, शत्रूला पळवून लावलं आणि हिंदूंचा विजयध्वज कसा फडकत ठेवला याचं वीरश्रीपूर्ण वर्णन या कवितेत केलेलं आहे. कवितेतले जोशपूर्ण शब्द, काळजाला भिडणारे प्रसंग, प्रत्येक कडव्याच्या शेवटी येणारे, यमक साधणारे खणखणीत शब्द, भारतीयांची  छाती अभिमानाने फुगविणारे इतिहासातले दाखले देऊन हिंदुंच्या वीरश्रीला साद घालणारी, त्यांचा आत्मविश्‍वास वाढविणारी विजयाची वर्णने अपेक्षित परिणाम नक्कीच साधतात, रोमांचित करतात. सावरकर या कवितेत, प्रभू रामचंद्रांनी केलेला रावणवध, सम्राट चंद्रगुप्ताने सिकंदराचा पराभव करून त्याचा सेनापती सेल्युकसला, त्याच्या ग्रीक सैन्यासह हिंदुकुश* पर्वतापर्यंत घ्यायला लावलेली माघार, शक व हूणांचा* शालिवाहन व विक्रमादित्य* यांनी केलेला पराभव, मुस्लीम पातशाही नेस्तनाबूत करण्यासाठी शिवाजी महाराजांनी उभारलेला स्वातंत्र्यलढा व मिळवलेले विजय, सदाशिवभाऊ पेशव्यांच्या नेतृत्वाखाली दक्षिणेची मोहिम फत्ते केल्यानंतर उत्तरेच्या मोहिमेत २ ऑगस्ट  १७६० रोजी मराठ्यांनी जिंकलेलं दिल्लीचं तख्त* या व अशा ओजस्वी इतिहासाची हिंदु बांधवांना आठवण करून देऊन, इंग्रजी सत्तेविरुद्ध लढण्यासाठी व हिंदू विजयध्वज फडकविण्यासाठी कवी  या कवितेद्वारे हिंदूंना उद्युक्त करीत आहेत.

*हिंदुकुश पर्वत = हिमालयीन पर्वत रांगांचा अफगाणिस्तान पासून ताजिकिस्तान पर्यंत पसरलेला पश्चिमेकडील भाग.

*शक व हूण = पूर्व/मध्य आशियातील रानटी, लुटारू टोळ्या

*शालिवाहन  = गौतमीपुत्र सातवाहन/ सालाहन/ सालीहन ( इ स ७२ ते ९५) म्हणजेच शकारी किंवा शककर्ता शालीवाहन. शकांवरील विजयाचे (इ.स.७८) स्मरण म्हणूनच त्याने चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारे शालिवाहन शक १९४५ वर्षांपूर्वी सुरू केले. हे युद्ध आताच्या नाशिक परिसरात झालं, कारण नाशिकला लागूनच गुजरात व राजस्थान इथं शक राजा नहापानने आपली सत्ता प्रस्थापित केली होती.. याविषयीचा शिलालेख  नाशिक येथे उपलब्ध आहे.

*विक्रमादित्य = दुसर्‍या चंद्गुप्ताचा नातू स्कंदगुप्त. याने देखिल आपल्या आजोबांप्रमाणे विक्रमादित्य हे बिरुद धारण केले होते.

*मंदसर(मंदोसर/मंदसौर)= मेवाड व माळवा यांच्या बाॅर्डरवरील शहर. येथे अफूची शेती होते. हे रावणपत्नी मंदोदरीचं माहेर मानलं जातं. येथे झालेल्या युद्धात विक्रमादित्याने हूणांचा दारूण पराभव  केला. त्यानंतर ४०/५० वर्षे हूणांनी भारतावर आक्रमण केले नाही.

*दोन ऑगस्ट १७६० रोजी दिल्ली जिंकल्यानंतर दोन महिन्यांनी मराठ्यांनी १० ऑक्टोबर रोजी शाह आलम या मुघल वंशजाला दिल्लीच्या गादीवर बसवलं.

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ अंगाई… कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ. ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ अंगाई…  कवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे  

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

‘आई’ हे आपले परमदैवत. आई म्हटले की आठवतो तो तिचा प्रेमळ उबदार स्पर्श, तिने भरविलेला मऊ दुधभात आणि तिने अंगाई म्हणत आपल्याला निजवणे. तिच्या प्रेमळ आवाजाने आपल्याला छान झोप येई. देव देवतांच्या जन्मोत्सवाचे वेळी जे पाळणे म्हटले जातात त्याच पारंपारिक चालीवरती डॉ. निशिकांत श्रोत्री सरांनी ही ‘अंगाई’ लिहिलेली आहे.

☆ अंगाई…  कवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆

निज निज निज बाळा

पाळणा तुजसाठी झुलविला

करी गाई गाई

तव आई गाई तुज अंगाई 

निज निज निज बाळा ||ध्रु||

खेळ किती रंगे

चिऊ काऊ भू भू माऊ संगे

रांगशी दुडुदुडू

सवंगडी सारे ते प्रेमाने

तुजवरती जीव

थकलाशी लाव पापणी डोळा

निज निज निज बाळा ||१||

ज्योती त्या विझल्या

निरांजनी शांतवुनीया गेल्या

तुजला लडिवाळा

निजवाया येई मिट्ट काजोळा

मनमोहन बाळा

निद्रेचा सगळा का धांडोळा

निज निज निज बाळा ||२||

चांदोबा आला

घेउनिया तारका  नि चांदण्या

चांदणे तुजला

अंगाई गाई निजवायाला 

डोळा पेंगुळला

मिटुनीया पापणीच्या पंखाला

निज निज निज बाळा ||३||

पाडसे निजली

हम्मेच्या शेजारी पहुडली

दूध पाजविले

कपिलेने त्यांना रे निजविले 

तया ना झोपाळा

तरी ही ती शांत कशी झोपली

निज निज निज बाळा ||४||

जादुई दुलई

घेउनी तुज निजवायला आली

तव सखी परिराणी

झोकाळा देई तुज झुलवूनी

वाजवी ना वाळा

नीज अता मिटुनी घेई डोळा

निज निज निज बाळा ||५||

शांत तरूतळा

विसावुनी पाचोळा ही निजला

वारा ही शमला

सैरभरा घोंगावूनी थकला

शिणविसी का डोळा

झुलवीते तुज देउनी हिंदोळा

निज निज निज बाळा ||६||

हे कुलभूषणा

नाव करी दिगंत दाही दिशांना

तव रूप छान

आम्हाला तुझा किती अभिमान

तू अमुचा जीव

श्रीराम कृष्णसखा तू देव

निज निज निज बाळा ||७||

 – डॉ. निशिकान्त श्रोत्री

अंगाई…राजकपूर — कवी — डॉ.  निशिकान्त श्रोत्री ☆ रसग्रहण – सौ. ज्योत्स्ना तानवडे 

निज निज निज बाळा

पाळणा तुजसाठी झुलविला

करी गाई गाई

तव आई गाई तुज अंगाई

निज निज निज बाळा ||ध्रु||

अरे सोनुल्या, माझ्या बाळा, आता गाई गाई कर. शांत झोपी जा. तुझ्यासाठी मी पाळणा झुलवीते आहे. मी तुझी आई तुला अंगाई गाते आहे. आता गाई गाई कर. अगदी मृदू आवाजात आई आपल्या तान्हुल्याला हे म्हणते आहे. या शब्दांमध्ये निज निज, आई, गाई, अंगाई या शब्दांमध्ये छान अनुप्रास साधल्याने या अंगाईला छान लय प्राप्त झाली आहे.

खेळ किती रंगे

चिऊ काऊ भू भू माऊ संगे

रांगशी दुडूदुडू

सवंगडी सारे ते प्रेमाने

तुजवरती जीव

थकलासी लाव पापणी डोळा

निज निज निज बाळा ||१||

अरे छकुल्या, चिऊ, काऊ, माऊ, भू भू हे तुझे सवंगडी आहेत. त्यांच्याबरोबर तुझे खेळ किती रंगतात. तुझे हे खेळगडी पण तुझ्यावर किती माया करतात. त्यांच्याशी खेळताना तू घरभर कसा दुडूदुडू रांगत असतोस. खेळून खेळून तू आता दमला आहेस. तेव्हा आता तुझ्या पापण्या मिटू देत. आता छान गाई गाई कर.

बाळाचे जेवण तर चिऊ-काऊ शिवाय होतच नाही. आजूबाजूला पळणाऱ्या माऊ, भू भू बरोबर बाळ पण भरभर रांगत असते. अगदी बालवयापासून या प्राणी मित्रांशी त्याचे मैत्र जुळत जाते. इथे वापरलेल्या ‘दुडूदुडू’ शब्दाने रांगणारे बाळ आपल्याला डोळ्यासमोर दिसू लागते. चिऊ, काऊ, माऊ, भू भू हे शब्द बालकांच्या बोलीभाषेत आहेत.बाळाच्या बोबड्या बोलीत ते शब्द आणखीनच मोहक वाटतात. या शब्दात साधलेला अनुप्रास शब्दांची रंगत आणखीन वाढवतो.

ज्योती त्या विझल्या

निरांजनी शांतवुनीया गेल्या

तुजला लडिवाळा

निजवाया येई मिट्ट काजोळा

मनमोहन बाळा

निद्रेचा सगळा का धांडोळा

निज निज निज बाळा ||२||

अरे माझ्या सोन्या, त्या निरांजनातल्या वाती सुद्धा आता शांत होत विझल्या आहेत. अरे आता तुला झोपवायला मिट्ट काळोख आलेला आहे बघ. तरी सुद्धा न झोपता का एवढी झोपेची वाट बघतोस ? आता शहाण्यासारखा झोपी जा.

इथे काजोळा, धांडोळा या थोड्या अपरिचित शब्दांनी छान स्वरयमक जुळले आहे.इथेही लडिवाळा, बाळा, सगळा, धांडोळा, काजोळा यामधे सुंदर अनुप्रास साधलेला आहे.

चांदोबा आला

घेउनिया तारका नि चांदण्या

चांदणे तुजला

अंगाई गाई निजवायला

डोळा पेंगुळला

मिटुनिया पापणीच्या पंखाला

निज निज निज बाळा ||३||

अरे बघ, तो आकाशीचा चांदोबा तारका आणि चांदण्या घेऊन आला आहे. त्याचे हे चांदणे तुला निजवायला अंगाई गाते आहे. तुझे डोळे सुद्धा पेंगुळले आहेत. बाळा आता पापण्यांचे पंख मिटू देत. आता गाई गाई कर.

इथे गोष्टीतून, गाण्यातून ओळख झालेला चांदोमामा आणि त्याच्या चांदण्या बाळाच्या भेटीला येतात.इथेही छान अनुप्रास साधलेला आहे.

पाडसे निजली

हम्मेच्या शेजारी पहुडली

दूध पाजविले

कपिलेने त्यांना रे निजविले

तया ना झोपाळा

तरी ही ती शांत कशी झोपली

निज निज निज बाळा ||४||

अरे सोनुल्या, गाईची वासरं सुद्धा शहाण्या बाळासारखी तिच्या शेजारी झोपली आहेत. या कपिलेने त्यांना दूध पाजवून झोपविले आहे. त्यांच्यासाठी झोपाळा पण नाही. तरी सुद्धा बघ त्यांना कशी शांत झोप लागली आहे. मी तर तुला झोका देते आहे. तू पण आता शांत झोप.

आता इथे बाळाची समज वाढल्याने हम्मा आणि तिचे बाळ वासरू त्याचे दोस्त झालेले आहेत.

जादुई दुलई

घेउनी तुज निजवायला आली

तव सखी परिराणी

झोकाळा देई तुज झुलवूनी

वाजवी ना वाळा

नीज अता मिटुनी घेई डोळा

निज निज निज बाळा ||५||

अरे तुझी मैत्रीण ती परी राणी आहे ना ती तुझ्यासाठी जादूची दुलई घेऊन आली. तू झोपावंस म्हणून ती पण तुला झोका देते आहे. तेव्हा आता पायाचा चाळा थांबव. वाळा वाजवू नकोस. आता पटकन डोळे मिटून घे आणि शांत झोपी जा.

आता  इथे गोष्टीतली परी राणी बाळाला भेटायला येते. त्याला झोका देऊन झुलवीते  सुध्दा. झोकाळा, वाळा, डोळा, बाळा यात छान अनुप्रास साधला आहे त्यामुळे कवितेची लय आणखीन वाढली आहे.

शांत तरूतळा

विसावुनी पाचोळा ही निजला

वारा ही शमला

सैरभरा घोंगावूनी थकला

शिणविसी का डोळा

झुलवीते तुझ देउनी हिंदोळा

निज निज निज बाळा ||६||

रात्रीच्या शांत वेळी शांत असणाऱ्या झाडाखाली पडलेला पाचोळा सुद्धा शांतपणे निजला आहे. सगळीकडे सैरावैरा घोंगावत धावल्यामुळे वारा सुद्धा खूप थकून आता शांत झाला आहे. मग तूच अजून का जागा आहेस ? मी तुला झोका देत जोजवते आहे. आता शांत झोप.

बाळ आता आजुबाजूच्या निसर्गात रमायला लागते. त्यामुळे झाडे, वारा त्याला समजायला लागतात हे इथे लक्षात येते.

 हे कुलभूषणा

 नाव करी दिगंत दाही दिशांना

 तव रूप छान

आम्हाला तुझा किती अभिमान

तू अमुचा जीव

श्रीराम कृष्णसखा तू देव

निज निज निज बाळा ||७||

अरे सोनुल्या, तू आमच्या कुळाचे भूषण आहेस‌. तुझ्या गुणांनी, कर्तृत्वाने दाही दिशांत तुझे नाव होऊ दे. तुझे रुप हे खूप देखणे आहे. आम्हाला तुझा खूप अभिमान आहे. कारण तू आमचा जीव की प्राण आहेस. बाळा तू जणू श्रीराम श्रीकृष्णाचे गोजिरे बाळरूपडे आहेस. आता शांतपणे झोपी जा.

इथे गोष्टीतले राम-कृष्ण बाळाच्या भेटीला येतात. बाळ जसजसे मोठे होत जाते तसतसे त्याचे विश्व विस्तारत जाते. त्याच्या बालविश्वात हळूहळू परिसरातले सगळे प्राणी, पक्षी, गोष्टीतली पात्रे, आजुबाजूची माणसे बदलत जातात. अंगाईच्या प्रत्येक कडव्यात त्याचा छान उल्लेख आला आहे.

या अंगाई गीतात बाळाला झोपवताना आईच्या मनातील कोमल भावना अचूक शब्दात उत्कटपणे व्यक्त झाल्या आहेत. या भावपूर्ण रचनेतील कवीचे शब्दसामर्थ्य प्रभावी आहे.

कवितेत बहुतेक  सर्व कडव्यात छान अनुप्रास साधलेला आहे. त्यामुळे कवितेची विशिष्ट लय वाढलेली आहे आणि कवितेला नैसर्गिक स्वरूमाधुर्य प्राप्त झालेले आहे. यामुळेच बाळाला आपोआप गुंगी येऊन झोप लागते.

चांदोबा तारका घेऊन आला, चांदणे अंगाई गाते, परी राणी झोका देते, पाचोळा निजला, वारा थकला या वाक्यरचनेत चेतनागुणोक्ती अलंकाराचा छान उपयोग केलेला आहे. त्यामुळे ही सर्व पात्रे गीतामध्ये जिवंत होऊन सामोरी येतात आणि या गीताची रंगत आणखीनच वाढते.

झोपताना शांत झालेले बाळ जास्त संवेदनशील झालेले असते, तशीच बाळाला झोपवणारी आई जास्तच भावनाप्रधान झालेली असते. तिच्या सर्व कोमल भावना उचंबळून येतात. अंगाईतून ती बाळाला आजूबाजूचा निसर्ग, प्राणी, पक्षी यांची माहिती, अगदी स्वतःची ओळख पण सांगते. बाळाच्या मनात ते सर्व कुठेतरी नोंदले जाते. बाळ यातून आईचा आवाज, स्पर्श ओळखायला शिकते. सर्व गोष्टी ओळखायला लागते. शेवटी त्याला देवाच्या बाळरूपात बघणारी आई आपल्या तान्हुल्याचे मोठे झाल्यावरचे, त्याच्या यशाचे, कर्तृत्वाचे स्वप्न बघायला लागते.

या सर्व तरल भावना या कवितेत उत्स्फूर्तपणे व्यक्त झालेल्या आहेत. हळव्या मातृ हृदयाचे भावपूर्ण हुंकार अतिशय उत्कटपणे मांडणारी ही डॉ.श्रोत्री यांची भावमधुर अशी अंगाई आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ हिंदुनृसिंह…. स्व. वि. दा. सावरकर ☆ रसास्वाद – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆  हिंदुनृसिंह…. स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

☆  हिंदुनृसिंह…. स्व. वि. दा. सावरकर ☆

हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्ततम-तेजा

हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा

हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा

हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा

करि हिंदुराष्ट्र हें तूतें । वंदना

करि अंतःकरण तुज, अभि – नंदना

तव चरणिं भक्तिच्या चर्ची। चंदना

गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या

हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा

 

हा भग्न तट असे गडागडाचा आजी

हा भग्न आज जयदुर्ग आसवांमाजी

ही भवानीची ह्या पुन्हा गंजली धारा

ती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारा

गड कोट जंजिरे सारे । भंगले

जाहली राजधान्यांची । जंगले

परदास्य – पराभवि सारी । मंगले

या जगती जगू, ही आज गमतसे लज्जा

हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा

 

जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी

जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी

जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी

जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी

ती शुद्धि हेतुची कर्मी । राहुं दे

ती बुद्धि भाबड्या जिवां । लाहुं दे

ती शक्ति शोणितामाजीं । वाहुं दे

दे मंत्र पुन्हा तो दिले समर्थें तुज ज्या

हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा

 –  कवी – वि. दा. सावरकर

☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

प्रस्तुत कविता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ते रत्नागिरी येथे स्थानबद्ध असताना १९२६ मधे लिहिली आहे. (ते शाळकरी असताना लिहिली असा कांही लोकांचा गैरसमज आहे.)

या कवितेत प्रखर बुद्धिमंत सावरकरांनी फारशा प्रचलित नसलेल्या पण चपखल अशा मराठी व संस्कृत शब्दांचा वापर केला आहे. उदा. संभूत, दिप्तितम, चर्ची, गूढाशा, शोणित इ. या कवितेची रचना भूपतिवैभव या मात्रावृत्तात केलेली आहे.

छत्रपती शिवाजीमहाराज हे भारतीयांचे स्फूर्तिस्थान आहेतच पण त्यांच्याविषयी सावरकरांसारखा प्रखर देशभक्त जेंव्हा स्फुर्तीगीत लिहितो तेंव्हा ते महाराजांच्या भवानी तलवारीसारखं तेजःपुंज व धारदार होतं. पं. हृदयनाथ मंगेशकर व गानकोकिळा लता मंगेशकर या द्वयीने हे गीत स्फूर्तिदायक व रोमांचक बनवण्यात मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्यांचे सूर व संगीत इतकं अर्थवाही आहे की गीत ऐकल्यानंतर कुणीही भारतीय रोमांचित झाल्याशिवाय रहात नाही. या तीन कडव्यांच्या गीताच्या पहिल्या कडव्यात महाराजांचं स्तुतीपर वर्णन करून त्यांना वंदन केलेलं आहे. दुसर्‍या कडव्यात हिंदुस्थानातील सद्यस्थितीचं (त्या काळातलं -१९२६ मधलं) वर्णन केलं आहे आणि तिसऱ्या कडव्यात महाराजांकडं मागणं मागितलेलं आहे. जेणेकरून आपला स्वातंत्र्य लढा यशस्वी होईल.

पहिल्या कडव्यात ते महाराजांचं वर्णन ” हिंदूंच्या शक्तीतून प्रकट झालेलं तेज, हिंदूंच्या वर्षानुवर्षांच्या तपस्येचं फलित म्हणून जन्मलेला तेजःपुंज ईश्वरी अवतार, हिंदुदेवतेचा सौभाग्यालंकार, नरसिंहाप्रमाणे दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी अवतरलेला प्रभूचा अवतार” असं केलं आहे. आणि ते म्हणतात हे हिंदुराष्ट्र तुला वंदन करीत आहे, चंदनाचा लेप लावून तुझं पूजन करीत आहे, अंतःकरणपूर्वक अभिनंदन करीत आहे. सावरकर म्हणतात, ” माझ्या मनात ज्या गूढ आशा आहेत त्या मी तुला कथन करू शकत नाही. तरी त्या ओळखून, हे नृसिंहाचा अवतार असणाऱ्या शिवाजीराजा माझ्या या इच्छा तू पूर्ण कर. ” ही कविता लिहिली तेंव्हा सावरकर स्थानबद्धतेत असल्यामुळे स्वातंत्रप्राप्तीची इच्छा प्रकट करू शकत नव्हते म्हणून ‘गूढाशा’ हा शब्द वापरला आहे.

दुसर्‍या कडव्यात परकीय आक्रमणामुळे देशाच्या झालेल्या दुरावस्थेचं वर्णन केलं आहे. महाराजांनी निर्माण केलेल्या, जतन केल्या गड किल्ल्यांची अवस्था सांगितली आहे. कुठे तट भंगले आहेत, गड, कोट, किल्ले, जंजिरे भग्न पावले आहेत, राजधान्यांची जंगले झाली आहेत, साऱ्या मंगलगोष्टी परदास्यामुळे पराभूत झाल्या आहेत. महाराजांसारखे वीरपुरूष नसल्यामुळे भवानी तलवारीची धार गंजली आहे. अशातच आई भवानीही आधार देत नाही. अशा या जगात जगणं अत्यंत लज्जास्पद झालं आहे.

तिसऱ्या कडव्यात सावरकर म्हणतात, ” ज्या शुद्ध हृदयाच्या राजाला रामदास स्वामींनी आपलंसं केलं होतं, ज्या बुद्धिमान राजाने विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, बिदरची बरीदशाही व वऱ्हाडची इमादशाही अशा पाच शाह्यांना ‘त्राहि भगवान’ करून सोडलं होतं, जो राजा कूटनीतीचा युक्तीने उपयोग करून, वेळप्रसंगी तह करून, बलवान शत्रुला गाफील ठेऊन पराभूत करीत असे ; त्या राजाची अंतःकरणाची शुद्धी आमच्या कृतीत उतरू दे. ती बुद्धी माझ्या भाबड्या देशबांधवांना लाभूदे. ती शक्ती आमच्या नसानसातून (रक्तातून) वाहू दे. हे राजा, जो स्वराज्याचा मूलमंत्र तुला समर्थ रामदास स्वामींनी दिला, तो मंत्र तू आम्हाला दे. म्हणजे त्या मंत्रसामर्थ्याने, ती शक्ती व युक्ती वापरून, त्या शुद्धी व बुद्धीच्या योगाने आम्ही हिंदुस्थानचे बांधव परकियांना येथून हुसकावून स्वातंत्र्यप्राप्ती करून घेऊ. “

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ शोमॅन… कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ. ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ शोमॅन… कवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे 

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

राज कपूर, हिंदी चित्रपट सृष्टीचा शोमॅन. सगळे कलाविष्कार शो करणारा तो शोमॅन राजकपूर. त्या कलाकाराचे कौतुक करायला कवी निशिकान्त श्रोत्री यांनी वाहिलेल्या अनोख्या काव्यांजलीचे रसग्रहण करायचा मला मोह झाला….

कलाविश्वात आणि मनोरंजन विश्वात चित्रपटसृष्टीचे स्थान खूपच वरचे आहे. उत्तमोत्तम कलाकृती निर्माण करणारे प्रतिभावंत लेखक, पटकथाकार, गीतकार, संगीतकार, अभिनेते, अभिनेत्री यांची मोठी  आहे मांदीयाळी आहे. राज कपूर हे यातलेच एक लोकप्रिय नाव.  ‘राजकपूर’ ही डॉ. निशिकांत श्रोत्री यांची  एक आगळी वेगळी कविता आहे. राजकपूर म्हणजे एक यशस्वी अभिनेता, निर्माता, आणि दिग्दर्शक. त्याच्या अनेक सिनेमांनी यशाचे वेगवेगळे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. यातीलच अतिशय गाजलेले तीन यशस्वी चित्रपट म्हणजे आवारा,  श्री ४२०, जागते रहो. याच तीन चित्रपटांच्या कथानकावर आधारित,   एकदम वेगळेच हटके काव्यसूत्र असलेली ही एक वैशिष्ट्यपूर्ण कविता आहे.

☆ राजकपूर … कवी — डॉ.  निशिकान्त श्रोत्री ☆

कलेसी बहार आणी तो दुजा तर नाही कोणी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी  ||ध्रु||

तहान वात्सल्याची जीवा प्रेमाची मायेची

वाट जीवना संस्काराची ना केवळ नात्याची

द्याया संदेश हंसवूनी येई आवारा घेउनी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी    ||१||

देश ग्रासला बेकारीने शिकलेला भरडला

धनाढ्य लुच्चे लोभी फसवित दीनांना दुबळ्यांना

दावूनिया चारसोबीसी केले सकल जनांना ज्ञानी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी  ||२||

मुखड्यामागे पाप धनाच्या तहानल्या ना पाणी

काळा पैसा खोट्या नोटा कोण गुन्ह्याचा धनी

करुनि सर्वांना सावध जागते रहो सांगूनी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी  ||३||

©️ डॉ. निशिकांत श्रोत्री

मो. ९८९०११७७५४

☆ शोमॅन…राजकपूर — कवी — डॉ.  निशिकान्त श्रोत्री ☆ रसग्रहण – सौ. ज्योत्स्ना तानवडे

कलेसी बहार आणी तो दुजा तर नाही कोणी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्थानी ||ध्रु||

चित्रपटात अभिनय, दिग्दर्शन, कथानक, संगीत, नृत्य अशा अनेक कलांचा संगम असतो. या सर्वच आघाड्यांवर राज कपूरनी वेगवेगळे यशस्वी प्रयोग केले आणि त्या जास्तीतजास्त लोकप्रिय बनवल्या. त्याच्या गाणी आणि संगीतांने बहार उडवून दिली. राज कपूर यातला एक चांगला जाणकार होता. मूळामध्ये तो एक अस्सल हिंदुस्तानी कलाकार होता. एक यशस्वी चित्रपट कसा बनवायचा यात तो माहीर होता. म्हणून तो ‘या सम हा !’ अशा पदापर्यंत पोहोचला होता.

तहान वात्सल्याची जीवा प्रेमाची मायेची

वाट जीवना संस्काराची ना केवळ नात्याची

द्याया संदेश हंसवूनी येई आवारा घेउनी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्तानी ||१||

प्रत्येक जीवाला आयुष्यात वात्सल्याची ओढ असते. तितकीच प्रेमाची, मायेची पण आस असते. यासाठी फक्त नातीच गरजेची नसतात तर त्या बरोबरीने चांगले संस्कारही होणे खूप गरजेचे असते. हाच संदेश विनोदी ढंगाने हसवत हसवत  ‘आवारा’ हा सिनेमा देतो. ही गोष्ट कवीने अतिशय साध्या सोप्या शब्दात सांगितली आहे. माणूस प्रेम, वात्सल्य, माया मिळाली की शांत, संयमी, विवेकी बनतो. या उलट यापासून वंचित असणारे जीव भडक स्वभावाचे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे बनतात. प्रेम, जिव्हाळाच त्यांना पुन्हा सन्मार्गावर आणतो. हेच रंजक पद्धतीने हा सिनेमा सांगतो. प्रेक्षकांची अचूक नस ओळखून अतिशय मनोरंजक पद्धतीने कथानक फुलवत नेलेले आहे. अर्थपूर्ण गाणी आणि श्रवणीय संगीताने चित्रपट खूप लोकप्रिय झाला.

देश ग्रासला बेकारीने शिकलेला भरडला

धनाढ्य लुच्चे लोभी फसवित दीनांना दुबळ्यांना

दावूनिया चारसोबीसी केले सकल जनांना ज्ञानी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्तानी ||२||

राज कपूरचा दुसरा लोकप्रिय चित्रपट म्हणजे श्री ४२०. त्याचीच ही कथा. देशामध्ये बेकारी वाढल्यामुळे त्यात शिकलेले लोकही भरडले जातात. अशावेळी धन दांडगे लोभापायी त्यांची फसवणूक करतात. दीनदुबळ्यांची परिस्थिती आणखीनच हलाखीची बनते. ही सर्व परिस्थिती कवीने पहिल्या दोन ओळींमध्ये नेमक्या शब्दात वर्णन केलेली आहे. हे पाहून नायक  धनाढ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देतो. अगदी चारसोबीसी करून गरिबांना न्याय मिळवून देतो आणि तो श्री चारसोबीस ठरतो. कारण तो सर्व सामान्यांसाठी लढणारा एक सर्वसामान्य नायक असतो.

मुखड्यामागे पाप धनाच्या तहानल्या ना पाणी

काळा पैसा खोट्या नोटा कोण गुन्ह्याचा धनी

करुनि सर्वांना सावध जागते रहो सांगूनी

राज कपूर तो जानी अंतर्यामी हिंदुस्तानी ||३||

धनाढ्यांच्या मुखड्यामागे पाप दडलेले असते त्यामुळे गरजवंत कायम वंचितच रहातात. पण हा काळा पैसा, ही बनवेगिरी या मागचा खरा गुन्हेगार कोण ते कळतच नाही. या खोट्या मुखवट्यां मागचे खरे चेहरे आणि बंद दाराच्या आत चालणारे भ्रष्ट उद्योग बघून नायक सर्व सामान्यांना त्याची जाणीव करून देतो आणि जागते रहो अशी साद घालतो. राज कपूरच्या ‘ जागते रहो ‘ चित्रपटाची ही कहाणी. कवीने अतिशय मोजक्या पण अचूक शब्दात ती सांगितली आहे.

सर्व सामान्यांची दीनदुबळी दुनिया त्याच वेळी धनाढ्य, ढोंगी, अत्याचारी लोकांचे अन्यायी जग आणि या अन्यायाविरुद्ध झगडणारा सामान्यातलाच एक नायक हे या तीनही चित्रपटातले सूत्र आहे. केवळ चार ओळींमध्ये ते नेमके कथानक सांगणे हे कवीचे खास कसब आहे. कसलेही बोजड शब्द, अलंकारिक भाषा न वापरता साध्या सरळ शब्दात सहजपणे पण परिणामकारक पद्धतीने ते सांगितले आहे. एक लयबद्ध अशी ही कविता राज कपूरच्या चित्रपट कारकीर्दीतील या तीन महत्त्वाच्या सिनेमांची उत्तम दखल घेणारी आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ संसाराच्या रंगपटावर… कवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ संसाराच्या रंगपटावर… कवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे 

ही दुनिया एक प्रचंड मोठा रंगपट आहे. त्यावर प्रत्येक जण आपल्या वाट्याला आलेली भूमिका यथाशक्ती वठवत असतो.  कोणी अगदी नटश्रेष्ठ ठरतो तर कुणाची नुसती दखल सुद्धा घेतली जात नाही. या सर्व खेळाचा सूत्रधार चराचर व्यापून उरलेला तो विश्वेश असतो. हा एक खूप मोठा चिंतनशील, विचारप्रवर्तक अभ्यासाचा विषय आहे. याच विषयावरील डॉक्टर निशिकांत श्रोत्री सरांची ‘संसाराच्या रंगपटावर’ ही अतिशय सुंदर कविता आहे. ती आपल्याला या खेळाचा जणू ट्रेलरच दाखवते.

☆ संसाराच्या रंगपटावर ☆

ब्रह्मांडी लपला विश्वेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश ||ध्रु||

 

मंचावर येतांना पसरे

हृदयांतरी सकलांच्या मोद

हंसवुनी रडवूनीया जगता

अंतर्यामी नाही खंत

कनात खाली उतरता परी

देउनी जाई सर्वा क्लेश

संसाराच्या रंग पटावर

घेवुनी येई नाना वेश ||१||

 

जगण्याला भूमिका घेवूनी

          सवे आणतो काही कर्म

कधी भरजरी अंगी शेला

कधी नागवा सांगे वर्म

वसुंधरा ना भास्करमाला

कुठे उराशी धरिशी देश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश ||२||

 

पडदा पडला खेळ संपला

देह सोडूनी उडून गेला

कर्म परंतु शेष राहिले

शोधत राही नवकायेला

देहा मागुनिया देहाच्या

शोधासाठी नव आवेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश  ||३||

 

नवा खेळ अन् भूमिका नवी

कथा कुणाला ठाऊक नाही

कशास आलो काय कराया

देहामध्ये विसरून जाई

संवादाची ओळख नाही

किती काळचा नवा प्रवेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश  ||४||

©️ डॉ.  निशिकान्त श्रोत्री

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

☆ रसग्रहण ☆ संसाराच्या रंगपटावर… कवी — डॉ.  निशिकान्त श्रोत्री ☆

ब्रह्मांडी लपला विश्वेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश ||ध्रु||

हे तीन ओळींचे वेगळे असे या गीताचे वैशिष्ट्यपूर्ण ध्रुवपद आहे. या अखिल ब्रम्हांडात तो विश्वेश लपलेला असतो. सर्वत्र भरून राहिलेला असतो. वेळोवेळी तो वेगवेगळी रुपे घेऊन साकार होतो. प्रत्येकातच हृदयस्थ आत्माराम म्हणजे तोच ईश्वरी अंश असतो. तोच वेगवेगळ्या जीवांच्या रूपाने प्रकट होतो.

मंचावर येताना पसरे

हृदयांतरी सकलांच्या मोद

हंसवुनी रडवूनीया जगता

अंतर्यामी नाही खंत

कनात खाली उतरता परी

देउनी जाई सर्वा क्लेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश ||१||

या पहिल्या कडव्यात कवीने जन्म आणि मृत्यू या घटनांचे सुयोग्य शब्दात वर्णन केले आहे. बाळ जन्माला आले की सर्वांना अतिशय आनंद होतो. नव्या जीवाचे जल्लोषात स्वागत होते. तोही आपल्या बाललीलांनी,  पुढे आपल्या गुणांनी सर्वांना कधी आनंद देतो तर कधी रडवतो. हे करीत असताना स्वतः त्यात न गुरफटका तो मात्र वाट्याला आलेली भूमिका जगून घेतो. शेवटी डाव संपला की खेळाची कनात उतरवली जाते म्हणजे त्याचा मृत्यू होतो. त्यावेळी मात्र त्याच्या जाण्याने सर्वांना खूप दुःख होते. याच पद्धतीने तो विश्वेश वेगवेगळ्या जीवांमधून वेगवेगळी भूमिका साकारत असतो. इथे कनात उतरवण्याच्या रूपकातून मृत्यूची संकल्पना अधिक स्पष्ट केली आहे. एखाद्या डाव किंवा खेळ संपला की उभारलेली कनात उतरवतात. त्याचप्रमाणे जन्माला आलेला जीव मृत्यू पावतो. ही कनात उभारण्याची आणि कनात उतरवण्याची प्रक्रिया अव्याहतपणे सुरू असते.

जगण्याला भूमिका घेवूनी

सवे आणतो काही कर्म

कधी भरजरी अंगी शेला

कधी नागवा सांगे वर्म

वसुंधरा ना भास्करमाला

कुठे उराशी धरिशी देश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश ||२||

जन्माला आलेला जीव आपली भूमिका कशी निभावतो हे कवीने या दुसऱ्या कडव्यात विशद केलेले आहे. कधी कधी जगण्यासाठी काही विहित कर्म बरोबर घेऊन त्याला योग्य अशी भूमिका घेऊनच हा जीव जन्माला येतो. कधी राजा म्हणून, तर कधी उच्चपदस्थ कार्यनिपुण अधिकारी म्हणून, कधी कलानिपुण कलाकार म्हणून, तर कधी समाजाचे भूषण अशी सन्माननीय व्यक्ती म्हणून जन्माला येतो. कर्तृत्वाचा, सन्मानाचा शेला पांघरून येतो. तर कधी तपस्वी, संन्याशी, विरक्त योगी बनून सर्वांना जीवनाचे वर्म, जगण्याचे प्रयोजन, सार्थकता याविषयी प्रबोधन करतो. असा हा विश्वेश अखंड ब्रम्हांडाला व्यापून राहिलेला असतो. सगळी पृथ्वी किंवा अख्खी सूर्यमालाही जिथे त्याला सामावून घेऊ शकत नाही तिथे देशाच्या सीमांचा तर प्रश्नच येत नाही. त्यात तो मावणारच नाही.

समाजात आदर्श म्हणून आदर सन्मान मिळून सन्मानाचे उच्च पद मिळणे आणि त्याद्वारे मिळणारे ऐश्वर्य, सौख्य उपभोगणे यालाच भरजरी शेल्याचे रूपक योजिले आहे. तर उग्र तपश्चर्या करून वैराग्य प्राप्त केलेले विरक्तयोगी तपस्वी यांच्यासाठी नागव्याचे रूपक योजिले आहे. म्हणजे ते जगरुढीत न गुरफटता आपली वाट आपल्या मनाप्रमाणे चोखाळतात.

पडदा पडला खेळ संपला

देह सोडूनी उडून गेला

कर्म परंतु शेष राहिले

शोधात राही नवकायेला

देहा मागुनिया देहाच्या

शोधासाठी नव आवेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश ||३||

या तिसऱ्या कडव्यात अविनाशी आत्म्याचा प्रवास कवीने स्पष्ट केलेला आहे.

वासांसि जीर्णानि यथा विहाय

नवानि गृह्णाति  नरोऽपराणी

तथा शरीराणि विहाय  जीर्णा-

न्यन्यानि संयाति नवानि देही ||

गीतेतील या श्लोकाचा अर्थ कवीने इथे अधिक स्पष्ट केलेला आहे. जसा खेळ संपला की पडदा पडतो. त्याप्रमाणे आपले विहितकर्म संपले की जीवाचा शेवट म्हणजे मृत्यू होतो. आत्मा हा जीव सोडून निघून जातो. ज्याप्रमाणे आपण आपले जुने वस्त्र जीर्ण झाले की ते बदलून नवीन वस्त्र परिधान करतो. त्याप्रमाणे आत्मा एका देहातून निघाला की दुसऱ्या नवीन देण्यात अवतीर्ण होतो. इथे कवी म्हणतो की त्या जीवाचे जगणे संपले, पण कर्म अजून शिल्लक राहिलेले असते. ते पूर्ण करण्यासाठी आत्मा नवीन देहाला शोधत फिरतो. अशाप्रकारे तो एका देहानंतर दुसऱ्या देहाच्या शोधासाठी नव्या जोमाने फिरत राहतो आणि नवीन वेश परिधान करून नव्या भूमिकेत रंगपटावर येतो.

नवा खेळ अन् भूमिका नवी

कथा कुणाला ठाऊक नाही

कशास आलो काय कराया

देहामध्ये विसरून जाई

संवादाची ओळख नाही

किती काळचा नवा प्रवेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश ||४||

एक भूमिका संपते. पुढे दुसरी,  त्यातून तिसरी असा जीवाचा प्रवास सुरूच असतो. त्याचे वर्णन कवीने या शेवटच्या कडव्यात केलेले आहे.

पुन्हा नवा खेळ सुरू होतो. नवीन भूमिका असते. पण त्याची नेमकी कथा कुणालाच ठाऊक नसते. आपण म्हणतो ना,  ” प्रारब्धात काय काय लिहून ठेवले आहे कुणास ठाऊक ?” पण त्या अज्ञानात सुख मानून जगताना आपण कशासाठी जन्माला आलो?  आपल्याला नेमके काय करायचे आहे ? याचाच विसर पडतो आणि या देहाचे चोचले पुरविण्यात देहात रमून जातो. त्या जीवाला आपल्या संवादाची तोंड ओळखली नसते. हा नवा प्रवेश किती काळाचा आहे हेही ठाऊक नसते. तरीही तो सतत वेगवेगळी रूपे घेऊन रंगपटावर येत असतो.

या सर्व प्रवासातून हे कळते की, आत्मा अविनाशी आहे, तो जुने वस्त्र बदलावे तसा देह बदलतो. पण एका जीवातून दुसऱ्यात प्रवेश, एका भूमिकेतून नव्याने वेषांतर करून नवी भूमिका वठवत या आत्म्याचा प्रवास अव्याहतपणे सुरू असतो. कथा, संवाद, कार्यकाळ काहीही आधी माहीत नसताना काही भूमिका अप्रतिम ठरतात. समाज मानसात कायमच्या कोरल्या जातात. तर काही उत्तम, काही ठाकठीक, काही सुमार, तर काही अगदीच नाकारल्या जातात.

ही संपूर्ण कविता रूपकात्मक आहे. प्रत्येक जीवात ईश्वर असतो आणि तो वेगवेगळी रूपे घेत प्रकटतो. तर प्रत्येक जीव अंतरात्म्यामुळे वेगवेगळ्या भूमिका वठवतो हे मुख्य रूपक आहे.

पहिल्या कडव्यात कनात खाली उतरणे या रूपकातून मृत्यू होणे हा अचूक अर्थ स्पष्ट होतो.

दुसऱ्या कडव्यात भरजरी शेला हे सामाजिक मानसन्मान, ऐश्वर्य, सौख्य यासाठी योजलेले रूपक आहे. तर नागवा हे रूपक निर्भीडपणे, परखडपणे समाज प्रबोधन करणारा विरक्त योगी, संन्यासी यांच्यासाठी योजले आहे .

तिसऱ्या कडव्यात पडदा पडला की खेळ संपतो या रूपकातून मृत्यू झाला की  जीवात्मा तो देह सोडून जातो आणि ती भूमिका संपते ही गोष्ट स्पष्ट होते.

अशा रीतीने उत्तम शब्द योजनेतून ही कविता जन्म-मृत्यूचे अव्याहत सुरू असणारे चक्र, त्या मागचा सूत्रधार आणि त्याच्या विविध भूमिका अतिशय सुंदर रीतीने विशद करते. जगाच्या व्यवहारावर अगदी चपखल शब्दात प्रभावीपणे प्रकाश टाकणारी डॉक्टर श्रोत्री यांची ही एक अतिशय सुंदर  कविता आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ द्यायचे तर… श्री वैभव जोशी ☆ रसास्वाद – सुश्री अर्चना देवधर ☆

? काव्यानंद ?

☆ द्यायचे तर… श्री वैभव जोशी ☆ रसास्वाद – सुश्री अर्चना देवधर

वैभव जोशी यांच्या गझलचं रसग्रहण

आज त्यांची  देवप्रिया(कालगंगा)वृत्तातली एक गझल मी रसग्रहणासाठी घेतली असून त्यातील प्रत्येक शेराचा आशय माझ्या कुवतीनुसार मांडण्याचा प्रयत्न केला आहे.आणखी अनेकांना यातील शेरांच्या अर्थाचे वेगळे पदर उलगडतीलच.

आजची रचना

द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा

लेखणीला वेदनेची जाण दे रे ईश्वरा

 

तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी

पण भुकेशी झुंजण्याचे त्राण दे रे ईश्वरा

 

जे युगांपासून काहीही कधी ना बोलले

त्या मुक्या ओठांस स्फूर्तीगान दे रे ईश्वरा

 

काय कामाचा गड्या कंठातला हा हुंदका

त्यापरी डोळ्यांमधे आव्हान दे रे ईश्वरा

 

मी कुठे म्हणतो मला दे अढळपद गगनातले

माणसांच्या काळजातच स्थान दे रे ईश्वरा

वैभव जोशी

आता प्रत्येक शेराचा आशय आपण पाहू..

शेर क्र.१

द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा

लेखणीला वेदनेची जाण दे रे ईश्वरा

एका लेखकासाठी किंवा साहित्यिकासाठी त्याची लेखणी हीच त्याला मिळालेली अमोघ अशी ताकद असते.आपल्यापाशी असलेली शब्दसंपदा लेखणीच्या माध्यमातून तो रसिक मायबापापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतो.पण या लेखणीतून फक्त शब्दबुडबुडे बाहेर न पडता जगातल्या दुःखितांच्या,पीडितांच्या वेदना जाणून घेण्याचं सामर्थ्य दे असं मागणं गझलकार ईश्वराकडे मागत आहे!खूप सुंदर असा मतल्याचा शेर!

शेर क्र.२

तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी

पण भुकेशी झुंजण्याचे त्राण दे रे ईश्वरा

या शेरात गझलकार वरवर अगदी साधं वाटणारं पण अतिशय कठीण,सत्वपरीक्षा पाहणारं मागणं ईश्वराकडे मागत आहेत.आपल्या अवतीभवती भुकेने तडफडणारे अनेक लोक आहेत आणि अशी वेळ कुणावरही,कधीही येऊ शकते!यदाकदाचित असा प्रसंग स्वतःवर कधी आलाच तर एकवेळ पोटाची खळगी भरायला भाकरी नाही दिलीस तरी चालेल,पण भूक सहन करण्याचं बळ दे,आणि तशा अवस्थेतही स्वत्वाची भावना कधी ढळू देऊ नकोस,पोटासाठी लाचारी पत्करायला लावू नकोस असं गझलकारांचं मागणं आहे..असं कुणी एखादाच मागू शकतो कारण आज माझं हक्काचं आहे ते हवंच पण दुसऱ्याचं आहे तेही हवं अशी लोकांची मनोधारणा बनत चालली आहे!खूप गहन अर्थाचा शेर!

शेर क्र.३

जे युगांपासून काहीही कधी ना बोलले

त्या मुक्या ओठांस स्फूर्तीगान दे रे ईश्वरा

वाह! या जगात जसे असामान्य लोक आहेत तसेच अतिसामान्यही आहेत.कुणी सडेतोड बोलून आपला कार्यभाग साधून घेतो तर कुणी मूग गिळून बसत सतत अन्याय सहन करत राहतो.बळी तो कान पिळी या न्यायाने मोठा अधिक मोठा होत जातो आणि सर्वसाधारण आहे तो जैसे थे अवस्थेत पिचून जातो.प्रत्येक युगात हे असंच चालत आलंय पण अशा वंचितांना आपली व्यथा बोलून दाखवण्याची स्फूर्ती परमेश्वराने द्यावी,त्यांच्या जाणिवा जागृत व्हाव्यात असं या शेरात गझलकारांचं मागणं आहे!सुंदर शेर!*ज्येष्ठ दिवंगत गझलकार कै. मधुसूदन नानिवडेकर यांची

बोल बाई बोल काही

हा अबोला ठीक नाही

असा शेर असलेली गझल मला सहज आठवली हा शेर वाचताना!

शेर क्र.४

काय कामाचा गड्या ओठातला हा हुंदका

त्यापरी डोळ्यांमधे आव्हान दे रे ईश्वरा

हाही शेर खूप उंचीचा खयाल असलेला!आधीच्या शेरात म्हटल्याप्रमाणे युगानुयुगे केवळ अन्याय सहन करत कुढत जगणाऱ्या माणसांच्या शब्दांना कधी तरी वाचा फुटावी आणि मनात दाटून आलेलं सगळं बाहेर यावं जेणेकरून पुढची वाटचाल सुकर होईल!

हो मोकळी बोलून तू हृदयात जे जे दाटले

का भावनांना आपल्या अव्यक्त मग ठेवायचे

या शेरात म्हटल्याप्रमाणे मनातल्या भावनांची कोंडी फुटल्याशिवाय जगणं सुखाचं होणार नाही आणि त्यासाठीच ईश्वराने आपलं मन मोकळं करण्याची स्फूर्ती माणसांना द्यावी,मूक हुंदके सहन करण्यापेक्षा परिस्थितीचं,काळाचं आव्हान पेलण्याची ताकद दे,अश्रूंपेक्षा हिम्मत दे असं गझलकार इथे सुचवतात.

शेर क्र.५

मी कुठे म्हणतो मला दे अढळपद गगनातले

माणसांच्या काळजातच स्थान दे रे ईश्वरा

वाह,हा शेवटचा शेर तर एखाद्या पोथीचा कळसाध्याय असावा तसा आहे!सामान्य माणसाला रोजची भाकरी आणि रहायला मठी असावी एवढीच अपेक्षा असते,त्याला कुठल्या शिखरावर जायची आस नसते आणि किमान सुखाचं आयुष्य लाभावं इतकं त्याचं अल्प मागणं असतं.

प्रस्तुत शेरात गझलकार म्हणतात की मला त्या ध्रुवासारखं आकाशातलं अढळपद मिळण्याची लालसा नाही तर अवतीभवतीच्या माणसांच्या काळजातच जागा हवी आहे जेणेकरून त्यांची सुखदुःख,व्यथा वेदना जाणून घेता येतील.स्वतःपुरेसंच जगण्याची संकुचित वृत्ती न जोपासता इतरांची मनं वाचण्याचा व्यापक दृष्टिकोन या शेरात प्रभावीपणे व्यक्त झाला आहे आणि म्हणूनच या शेरातला खयाल खूप उच्च दर्जाचा वाटतो!एका कवीसाठी, गझलकारासाठी माणसं वाचण्याहून  दुसरं मोठं काही नसतं असाही एक विचार इथे गवसतो!खूप आवडला हा शेर!

ही रचना मला का आवडली?

देवप्रिया वृत्तातली ही खूप सुंदर रचना आदर्श मानवी मूल्यांचा पुरस्कार करणारी असून त्यातला प्रत्येक शेर खास आहे. दे रे ईश्वरा या रदिफला अगदी समर्पक असे वरदान,जाण, त्राण, स्फूर्तीगान,आव्हान आणि स्थान हे कवाफी चपखलपणे वापरले आहेत. लेखणी,भूक,भाकरी,हुंदका,गगनातलं अढळपद अशी प्रतीकं, रूपकं आणि प्रतिमा या रचनेचं सौंदर्य खुलवतात त्यामुळे प्रत्येक शेर वाचकाच्या हृदयाला जाऊन भिडतो!श्री.वैभव जोशी यांच्या तरल आणि संपन्न प्रतिभेला मनापासून नमस्कार!आजच्या वाढदिवशी त्यांना मनापासून शुभेच्छा!

© सुश्री अर्चना देवधर 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ शतजन्मशोधितांना… वि. दा. सावरकर ☆ रसास्वाद : अज्ञात ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? काव्यानंद ?

☆ शतजन्मशोधितांना… वि. दा. सावरकर ☆ रसास्वाद : अज्ञात ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

शत जन्म शोधिताना ।

शत आर्ति व्यर्थ झाल्या ।

शत सूर्यमालिकांच्या ।

दीपावली विझाल्या ॥

तेव्हां पडे प्रियासी ।

क्षण एक आज गांठी ।

सुख साधना युगांची ।

सिद्धीस अंति गाठी ॥

हा हाय जो न जाई ।

मिठी घालू मी उठोनी ।

क्षण तो क्षणांत गेला ।

सखी हातचा सुटोनी ॥

“संन्यस्त खड्ग” ह्या संगीत नाटकांतील हे पद म्हणजे सावरकरांनी लिहिलेल्या अत्त्युच्च पदांमधील एक!! ह्या माणसाच्या प्रतिभेवर साक्षात सरस्वतीने भाळून जावे इतक्या विलक्षण प्रतिभेचा धनी, बौद्धिक संपदा अशी की चक्क कुबेराला आपली पारमार्थिक संपत्ती त्याच्यापुढे फिकी वाटावी, आणि राष्ट्रभक्ती तर अशी की भारतमातेने तिच्या ह्या पुत्राला झालेल्या यातनांनी आसवे गाळावीत तर तिचे अश्रूचं विनायक दामोदर सावरकर ह्या तेजपुंज व्यक्तिमत्वासमोर थिजून जावेत!! स्वातंत्र्यवीर/हिंदूहृदयसम्राट विनायक दामोदर सावरकर म्हणजे अग्निकुंड. अटलजी म्हणायचे तसे सावरकर म्हणजे तितीक्षा, सावरकर म्हणजे तिखट. अशा राष्ट्रपुरुषाला प्रेम काव्य सुचलं तर ते कसे असेल ह्याची दिव्यानुभूती म्हणजे वरील पद!! 

अंदमानातून सुटका झाल्यावर सावरकरांनी रत्नागिरीत स्थानबद्ध असतांना ”संन्यस्त खड्ग“ लिहिले. ह्या नाटकात पात्रे आहेत बुद्ध, विक्रमसिंग, वल्लभ आणि सुलोचना. सुलोचना ह्या पात्राच्या तोंडी हे गीत आहे. सुलोचना ही वल्लभची पत्नी. त्यांच्या लग्नाला जेमतेम काही दिवस झालेले असतात. नवीन-नवीन संसाराची आता कुठे वेल फुलायला लागली असते. एकेदिवशी त्यांचा प्रेमळ संवाद सुरु असतांना अचानक राज्यसभेचा निरोप येतो म्हणून वल्लभ तो प्रेमळ संवाद उमलायच्या आत अर्ध्यावरच सोडून तडक उठून राज्यसभेत निघून जातो. उशिरा केंव्हातरी सैनिक निरोप घेऊन सुलोचनेकडे येतो की सेनापती तर राज्यसभेतूनच थेट रणांगणावर युद्धासाठी गेले आहेत. तेंव्हा सुलोचनेच्या मनात आलेल्या ह्या भावना म्हणजे हे गीत.

आता गंमत बघा सुलोचना ही साधी स्त्री नाहीय. ती कर्तृत्ववान आहे. त्यामुळे ती फक्त प्रेमळ विरह गीत कसे गाईल?? सावरकरांची विलक्षण प्रतिभा बघा . प्रेम विरह गीतात देखील सुलोचनेच्या जाणिवा प्रगल्भ आहेत.तिचे विचार परिपक्व आहेत. अशी दमदार स्त्री जेंव्हा विरह गीत गात असेल ते देखील किती अत्त्युच्च असेल नाही??

शत जन्म शोधिताना ।

शत आर्ति व्यर्थ झाल्या ।

शत सूर्यमालिकांच्या ।

दीपावली विझाल्या ॥

सुलोचना म्हणते माझा प्रियकराचा शोध हा जन्मोजन्मांचा आहे. माझ्या ह्या शोधापुढे ‘शत’ आर्ति (दुःख, पीडा) व्यर्थ आहेत, आणि ह्यात सुलोचनेने कशाची आहुती दिली आहे तर शत सूर्य मालिकांच्या दीपावलीची.  म्हणजे सामान्य माणसांप्रमाणे सुलोचनेची दीपावलीची पणती ही मातीची नाहीय तर ती आहे शंभर सूर्यमालिकेची!! कल्पना देखील किती भव्य असावी??

तेव्हां पडे प्रियासी ।

क्षण एक आज गाठी ।

सुख साधना युगांची ।

सिद्धीस अंति गाठी ॥

प्रियकर मिलनाचे सायास तिला (सुलोचना) कष्टप्रद तपश्चर्येसारखे वाटत नाहीत.  तिच्यासाठी तर ही आनंदाने केलेली साधना आहे, जिची सिद्धी आता कुठे तिने ’गाठली’ आहे. सावरकरांची शब्दप्रभू संपन्नता बघा गांठी (गाठभेट) आणि गाठी (पोचणे किंवा गाठणे) काय भन्नाट यमक त्यांनी जुळविले आहे!!

हा हाय जो न जाई ।

मिठि घालु मी उठोनी ।

क्षण तो क्षणांत गेला ।

सखी हातचा सुटोनी ॥

पुढे सुलोचना म्हणते नुकतीच तर आमची भेट झाली आहे. त्याला (वल्लभाला) मिठी मारायला म्हणून मी उठले तर, तर तो क्षण एका क्षणात माझ्या हातून सुटून गेला, संपून गेला!! पु.ल.देशपांडे ह्यांनी म्हटल्याप्रमाणे ह्या एका ओळीसाठी सावरकरांना खरोखर साहित्यातील नोबेल पुरस्कार द्यायला हवा.

सावरकरांची अनेक रूपं मला आवडतात. विज्ञानाधिष्ठित सावरकर, शब्दप्रभू सावरकर, लढवय्ये सावरकर, कवी सावरकर, लेखक सावरकर, सामाजिक चळवळीचे प्रणेते सावरकर, ब्रिटिशांवर तुटून पडलेले सावरकर, धाडसी सावरकर, राष्ट्रासाठी आपल्या घराची राखरांगोळी केलेले सावरकर. एक मनुष्य त्याच्या सबंध आयुष्यात कदाचित परमेश्वरही घेण्यास धजावणार नाही इतकी जाज्वल्य रूपं घेऊ शकतो?? आणि ह्या प्रतिभावान आत्म्याला आपण करंटे भारतीय एका जातीत तोलून त्याला माफीवीर म्हणतो?? ह्याहून करंटा समाज कुठल्या तरी देशात असेल. सावरकरांच्या त्या जाज्वल्य आयुष्यातील धगधणाऱ्या अग्निकुंडातील एकतरी अग्निशिखा होण्याचे सौभाग्य मिळाले तरी एखाद्याचा जन्म सत्कारणी लागायचा. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांना शतशः नमन!!

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ हाचि नेम आता…संत तुकाराम महाराज ☆ रसग्रहण – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

☆  हाचि नेम आता…संत तुकाराम महाराज ☆ रसग्रहण – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ 

काव्यानंद

☆तुकाराम गाथा – अभंग ☆

हाचि नेम आतां न फिरें माघारी । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥

घररिघी जालें पट्टराणी बळें । वरिलें सांवळें परब्रम्ह ॥२॥

बळियाचा अंगसंग जाला आतां । नाहीं भय चिंता तुका म्हणे ॥३॥

रसग्रहण 

मला जाणवलेला व उमगलेला अर्थ…….

मनाचा निर्धार आणि संपूर्ण श्रद्धा यांचा अर्थ प्रकट करणारा हा अभंग आहे.

आता हाच माझा नेम (निश्चय केला, व्रत घेतले  किंवा मी ठरवले ) आहे.गोविंदा जवळ आहे,तिथून माघारी फिरायचे नाही.

संसाराचा मोह धरायचा नाही.

त्या गोविंदाच्या घरात मोठ्या प्रयासाने ( जप,तप,नामस्मरण, सदाचारी वर्तणूक, भूतदया इ.मुळे) आले आहे.व माझ्या वर्तणुकी मुळे पट्टराणी झाले आहे. त्या सावळ्या परब्रह्माला मनापासून वरले आहे.आता तेथून माघारी फिरणे नाही.

त्या बलवान म्हणजे सर्वव्यापी,सर्वांना जीवदान देणारा,चिंता हरणारा व षडरिपूं पासून दूर नेणारा असा जो गोविंद आहे त्याचा सहवास लाभला आहे.म्हणून आता कोणतेही भय,चिंता राहिली नाही.

यात गोविंद हा शब्द अचूक वापरला आहे. गो म्हणजे गायी पण त्याचा अजून एक इंद्रिये असाही अर्थ आहे.गोविंद म्हणजे इंद्रियांचा व्यवहार जाणतो व त्याचे नियमन  ( इंद्रिय विषयी विचारांचे उन्नयन ) करतो.

“घररिघी झाले” या चरणात “बळे” म्हणजे बळजबरीने असा अर्थ नसून बळे म्हणजे जो सर्वशक्तिमान आहे त्याची पट्टराणी असा आहे.

या वर विचार केल्यावर असे लक्षात आले की ते जीव व आत्मा यांच्या संदर्भात बोलत आहेत.जो जीव आजवर द्वैताच्या भावनेने वेगळा रहात होता,तोच जीव आता आत्मस्वरूपाच्या आनंदाने सर्वशक्तिमान परब्रह्माशी एकरूप झाला आहे. व संपूर्ण स्वयंभू झाला आहे.

अशा सर्वसाक्षी सर्वव्यापी गोविंदा पासून दूर जायचे नाही. इतर कोणत्याच मोहपाशात परतायचे नाही.परत षडरिपूंच्या आहारी जायचे नाही.आता कोणतीच भय,चिंता राहीली नाही.असे तुकाराम महाराज म्हणतात.

हा अर्थ व्यक्ती परत्वे भिन्न असू शकतो.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares