मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रिटर्न गिफ्ट… – अज्ञात (अर्थात आपल्यातलाच कोणीतरी एक) ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ रिटर्न गिफ्ट… – अज्ञात (अर्थात आपल्यातलाच कोणीतरी एक) ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

माझ्या नातवाने मला आज निरूत्तर केले. दररोज रात्री तो कितीही उशीरा घरी आला तरी माझ्या जवळ १०-१५ मिनिटे शांतपणे बसल्याशिवाय तो जेवत नाही. माझा मुलगा आणि सुनबाई ह्या बाबतीत माझ्याकडे सतत तक्रार करताना म्हणतात की मी त्याला लाडावून ठेवलं आहे. आता तर त्याचं लग्न देखील झालं आहे. घरी आल्यावर लवकर जेवून त्याने त्याच्या बायकोसमवेत वेळ घालवला पाहिजे. पण तसं होत नाही. आज अखेर तो नेहमीप्रमाणे माझ्या खोलीत आल्यावर मी त्याला तशी विनंती देखील केली. पण त्याचं उत्तर ऐकून मला गहिवरून आलं. मी निरूत्तर झालो. त्याला जवळ घेऊन मी घट्टपणे कवटाळून धरलं. माझ्या आजारपणाचा मला क्षणभर विसर पडून मी मनसोक्तपणे रडलो. पण माझ्या नातवाचा माझ्यात अडकलेला जीव पाहून मी सुखावलो देखील.

माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवत तो मला म्हणाला, ” आबा, रोज मला घरी आल्यावर भेटायला यायची गरज नाही असं जे आज तुम्ही म्हणालात ते आजचं आणि शेवटचंच. ह्या बाबतीत मी काय करायचे ते माझे मलाच ठरवू दे प्लीज. तुम्ही आईबाबांचं नका ऐकू. तुमचं माझं नातं नुसतं आजोबा नातवाचं नसून त्यात बऱ्याच आठवणी दाटीवाटीने बसलेल्या आहेत.

माझी आठवण जिथं पर्यंत मागे जाते तेंव्हापासून तुम्ही माझ्या सोबत आहात. अगदी लहानपणापासून आईबाबांचा हट्ट होता की मी वेगळ्या स्वतंत्र खोलीत झोपावे. मला तेव्हा एकटं झोपायला खूप भिती वाटायची. पण मी डोळे मिटेस्तोवर तू मला कपाळावर थोपटत श्लोक म्हणायचास. तुझा तो रेशमी स्पर्श झाला की किती बरं वाटायचं. त्यानंतर शाळेला जाताना बसस्टॉपवर तू मला सकाळी सोडायला आणि दुपारी आणायला यायचास. घरी आल्यावर शाळेतील मजा माझ्या तोंडून ऐकताना तू रंगून जायचास. मी मोठा होत गेलो पण माझ्यासाठी तू तोच राहिलास. मोठ्या शाळेत स्पोर्ट्स डे असो किंवा गॅदरिंग तू येतच राहिलास घरचा प्रतिनिधी म्हणून.

पुढे काॅलेज ऍडमिशन साठी फाॅर्म च्या लाईनीत उभा राहिलास. काॅलेजच्या पहिल्या दिवसाची आठवण म्हणून संध्याकाळी माझ्यासोबत फोटो काढून घेतलास. माझी फायनल एक्झॅम असताना माझ्यासाठी रात्र रात्र जागून सोबत केलीस. डोळ्यांवरची पेंग जाण्यासाठी मला काॅफी बनवून द्यायचास. दोन वर्ष पदव्युत्तर शिक्षणासाठी मी परदेशी जायचं ठरवलं. मी तुझ्यापासून लांब रहाणार ही कल्पना सहन न झाल्याने एक दिवस तू स्वतःला खोलीत कोंडून घेतलंस. मी निघायच्या दिवशी मात्र मला हसत हसत निरोप दिलास पण हट्टाने मला विमानतळावर सोडायला आलास. तिथे तू मला मारलेली मिठी मी नाही विसरू शकणार.

आबा लहानपणी जेव्हा भिती वाटायची तेव्हा तू सोबत केलीस, माझ्या शैक्षणिक कालखंडातील प्रत्येक टप्प्यावर तू हिमालयासारखा माझ्या मागे उभा राहिलास. जेव्हा कधी निराश झालो तेव्हा मला सावरायला तू खंबीरपणे उभा राहिलास. परदेशातून शिकून आल्यावर नोकरीच्या पहिल्या दिवशी घरी आल्यावर हक्काने मला घेऊन प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन माझ्यासाठी प्रार्थना केलीस. आठवायचं म्हटलं तर कितीतरी गोष्टी आठवतील. तू खरंच सावली सारखी सोबत केलीस माझी. मी कमी वेळात आज जी काही प्रगती करून सुखी आयुष्य जगतोय ह्याच्या मागे तुझाच आधार आणि आशिर्वाद होता रे. म्हणूनच नोकरी सुरू झाली त्या दिवशीच मी माझ्यापुरता एक निर्णय घेतला. रोज घरी आल्यावर न चुकता तुझी विचारपूस करण्यासाठी तुला भेटायचेच. उशीर झाला तरी हरकत नाही. तुला झोप लागली असली तरी सुद्धा तुझ्या बेडजवळ थोडा वेळ बसून जायचं. माझी आणि केतकीची पहिली भेट झाली तेव्हा मी तुझ्या बद्दल सगळं सांगितलं तिला. मग तिनेच हट्ट केला म्हणून एक दिवस तुला बाहेर हाॅटेलात घेऊन गेलो तिच्यासाठी. आज आमचं लग्न झालं असलं तरीसुद्धा मी तुला आल्यावर भेटायला पाहिजे असा तिचा देखील आग्रह असतो.

आबा आजवर तु माझ्यासाठी जे जे केलंस त्याबदल्यात रिटर्न गिफ्ट म्हणून मी तुला रोज भेटतो. तुझी विचारपूस करतो. तुझ्या कपाळावर हात ठेवला की दिवसभराचा थकवा आणि टेन्शन क्षणांत दूर होतं. म्हणूनच मी शेवटपर्यंत भेटतच रहाणार. तू आई बाबांचं ऐकून मला तुला भेटण्यापासून परावृत्त करू नकोस प्लीज.

आबा तु माझा श्वास आहेस. तुझ्या शिवाय जगणं ही कल्पनाच मी करु शकत नाही. तुझ्या आजारपणात तू खूप थकला आहेस. उलट आता तर मी आणखी थोडा वेळ तुझ्या सोबत घालवयचा विचार करतो आहे. म्हणूनच माझी कळकळीची विनंती आहे तुला की माझ्या रिटर्न गिफ्टचा तू आनंदाने स्विकार करावास आणि मला एका ऋणातून मुक्त होण्यासाठी मदत करावीस “.

खरंच गेल्या जन्मीची पुण्याई म्हणून की काय असा नातू माझा जीव की प्राण बनला आहे. त्यामुळे नाईलाजाने का होईना पण त्याने दिलेली रिटर्न गिफ्ट स्विकारण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही.

” राजे तुमची रिटर्न गिफ्ट मला मान्य आहे ” त्याचे दोन्ही हात माझ्या छातीजवळ धरुन मी म्हणालो आणि त्याच आनंदात त्याने माझ्या कपाळावर त्याचे ओठ अलगद ठेवून मला गुड नाईट करत तो माझ्या खोलीबाहेर पडला.

लेखक : अज्ञात (अर्थात आपल्यातलाच कोणीतरी एक) 

लेखिका : सुश्री प्राची गडकरी

मो.  ९९८७५६८७५०

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “भारतीय सेनेतील योद्धा धन्वंतरी… – भाग – २” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

“भारतीय सेनेतील योद्धा धन्वंतरी… – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके 

(”हम सभी सहीसलामत वापस आयेंगे… और यहीपर फिर एक फोटो लेंगे!” पण या वाक्यातील सत्यता सर्वजण जाणून होते… लढाई होती ती.. खेळ नव्हे!  दुर्दैवाने यांमधील काही जण परतले नाहीत… त्यात शेरशहा होते !) – इथून पुढे — 

या संपूर्ण मोहिमेत डॉक्टर आढाव सैन्यासोबत अगदी काही मीटर्स अंतरावर वर होते. पंधरा सोळा हजारांपेक्षाही अधिक उंचीवर असलेल्या युद्धभूमीवर जखमी झालेल्या जवानांना तेथून खाली रुग्णालयात आणणे केवळ अशक्यच होते. हेलिकॉप्टरचा उपयोग नव्हता… एकच उपाय होता तो म्हणजे जखमीला पाठीवर किंवा स्ट्रेचरवर घालून खाली घेऊन येणे… आणि त्यावेळी गोळीबार तर सुरूच असणार होता. अशा भयावह परिस्थितीमध्ये डॉक्टर जर काही मीटर्सवर उपलब्ध असेल तर? आणि डॉक्टर राजेश आढाव साहेब नेमके तेथेच आणि लगेच उपलब्ध होते! महा भयावह थंडी, त्यात अंधार. उजेड दिसेल असे काही करण्याची अनुमती नव्हती. कारण रात्रीच्या अंधारात या दिसणा-या प्रकाशाच्या दिशेने गोळीबार होण्याची शक्यता अधिक होती. आणि तसे होतही होते. जीवघेण्या थंडीमुळे सलाईनच्या नळ्या, त्यातील द्रव गोठून जात होते. मग त्यासाठी एखाद्या खडकावर अंगातले कोट टाकून आडोसा करायचा… त्याखाली स्टोव पेटवून सलाईन गरम करून पातळ करायची… त्याच अंधारात सैनिकांच्या गोठून गेलेल्या शरीरांत रक्तवाहिन्या शोधायच्या आणि त्यांत सलाईन लावायचे… जखमा शिवायच्या…. सैनिकांना… ”मैं हूं ना!” म्हणत धीर द्यायचा… वरून गोळीबार सुरु आहे.. बॉम्ब फुटत आहेत…. आणि इथे डॉक्टर प्राण वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करताहेत… आणि त्यात यांना भरपूर यशही मिळते आहे…. एकदा तर असेच उपचार करीत असताना राजेश साहेबांच्या हाताला शत्रूने डागलेल्या बॉम्बगोळ्याने जखम झाली.. रक्त वाहू लागले… डॉक्टर साहेबांनी स्वत:च आपल्या हाताला बँडेज बांधले… आणि इतरांवर उपचार सुरूच ठेवले… एक अप्रतिम इतिहास घडत होता!

कॅप्टन विक्रम बात्रा हे तर जणू डॉक्टर राजेश यांचे जिवलग मित्रच बनले होते. काहीवेळा पूर्वीच एका जवानाने बात्रा साहेबांचा निरोप आणला होता… ते पुढे वरच्या बाजूला सुमारे पंचवीस मीटर्सवर दबा धरून बसलेले होते… काही वेळातच वर चढत जाऊन शत्रूवर हल्ला करायचा होता… बात्रा साहेबांचे डोके दुखू लागले होते.. तेथील हवामानात प्राणवायू कमी असल्याने असे होत असते. डॉक्टर साहेबांनी प्रत्येक सैनिकाकडे आणीबाणीच्या प्रसंगी वापरायची औषधे दिली होती… बात्रा साहेबांनी तेथूनच ओरडून विचारले… ”डॉक्टरसाहब.. कौन सी गोली चलेगी!” डॉक्टर साहेबांनी तेथूनच ओरडून सांगितले… ”विटामिन सी काम करेगी!” आणि बात्रा साहेबांना खरेच आराम पडला.

पहाटेचे चार वाजले असतील. कॅप्टन नवीन नागप्पा साहेब बात्रा साहेबांच्या समवेत लढत होते.. त्यांच्या दोन्ही पायांच्या बरोबर मध्ये एक बॉम्बगोळा पडून फुटला… त्यांचे दोन्ही पाय प्रचंड निकामी झाले…. त्यांना पाहून बात्रा साहेबांनी धाव घेतली त्या तसल्या गोळीबारात… जखमी झालेल्या नवीन नागप्पा साहेबांना त्यांनी उचलून खांद्यावर घेतले… म्हणाले… ”तुम शादीशुदा हो.. family वाले हो… तुम्हारा बचना जरुरी है! असे म्हणून त्यांनी नवीन यांना सुरक्षित जागी आणून ठेवले… आणि स्वत: लढायला पुढे गेले!

काही वेळाने एका जवानाने नवीन साहेबांना खांद्यावर लादून डॉक्टर साहेबांकडे आणले… नवीन साहेब मोठ-मोठ्याने हुंदके देत देत रडत होते… डॉक्टरसाहेबांना खूप आश्चर्य वाटले… जखमा तर मी व्यवस्थित बांधल्या आहेत… वेदनाशामक इंजेक्शनही दिले आहे.. मग तरीही हा अधिकारी एवढा तळमळतो का आहे? मग त्यांच्या लक्षात आलं… हे शरीराच्या वेदनांचे दु:ख नव्हते.. काळजाचे दु:ख होते…. ”डॉक्टर साहेब… आपला शेरशहा आपण गमावला…!” हे ऐकताच, नवीन त्यांना तुम्ही जाऊ नका… तेथे धोका आहे… गोळीबार सुरु आहे”. असे सांगत असतानाही डॉक्टरसाहेब त्या जागेपर्यंत पळत गेलेच…. त्यांनी बात्रा साहेबांना उचलण्यासाठी त्यांच्या पाठीखाली हात घातला… तिथे फक्त एक पोकळी होती.. रक्तमाखली! सिंह निघून गेला होता… पण त्याच्या चेह-यावर मोठे हास्य होते!

सैनिक म्हणाले… त्यांनी आमचा सिंह मारला… आता आम्हांलाही जगण्याचा अधिकार नाही… दुस-याच दिवशी बात्रा साहेबांच्या बलिदानाचा प्रतिशोध घेण्यासाठी आपल्या सैन्याने पुन्हा एकदा जोरदार प्रतिहल्ला चढवला.. तो ही दिवसा उजेडी… पाकड्यांना असा दिवसा हल्ला केला जाईल याची कल्पनाच नव्हती… ते मस्त स्वयंपाक करत होते, आराम फर्मावत होते… भारतीय सैनिक त्यांच्यावर चालून गेले…. तेथे होते तेवढ्या शत्रूला त्यांनी कंठस्नान घातले.. आणि ते शिखर ताब्यात घेतले…. कित्येक पाकिस्तानी मारले गेले… डॉक्टरसाहेब सैनिकांसोबत होतेच. त्यांच्य मनात तर डरपोक पाकिस्तानी सैन्याबद्दल प्रचंड राग होता… त्यांनी त्यांच्या हातात असलेली एके-४७ रायफल सज्ज करून तिच्यातून मृत पाक सैनिकांच्या देहांवर गोळ्या डागल्या… !

इतक्या कठीण परिस्थितीमध्ये देशासाठी प्राण पणाला लावणा-या सैनिकांचे डॉक्टरसाहेबांना अतिशय कौतुक वाटे. यातला कुणीही मरणाला घाबरत नव्हता. एरव्ही डॉक्टर साहेबांना प्रेमाने आणि आग्रहाने खाऊ घालणारा जवान, बास्केट बॉलचा निष्णात कोच असे एरव्ही अन्य भूमिकांत असणारे अनेक जण आज अचानक लढवय्ये बनून शत्रूवर चाल करून निघाले होते.

रात्रीच्या अंधारात एका खडकावर आपला उजवा जखमी हात डाव्या हाताने धरून एक जवान बसला होता… डॉक्टर साहेब त्याच्यापर्यंत पोहोचले… त्याचा आपला एकच प्रश्न.. ”डॉक्टरसाब… मेरा हात फिरसे जुड जायेगा ना? नहीं तो मुझे वापस घर जानाही नहीं है!” डॉक्टर साहेबांनी पाहिले… केवळ कातडीच्या आधारे त्याचा तो हात लटकत होता… तरीही त्यांनी त्याला धीर दिला… ”क्यों नहीं… जरूर ठीक हो जायेगा.. और जुडेगा जरूर!

आणि त्यानंतर तो सैनिक काहीसा ग्लानीत गेला. डॉक्टरांनी मोठ्या कौशल्याने त्याच्या जखमा बांधल्या… रक्तस्राव बंद केला…. त्याला जरूर ती औषधे दिली… आज तो जवान एके ठिकाणी बास्केट बॉल प्रशिक्षक आहे. जेंव्हा केंव्हा त्याची भेट होते.. तेंव्हा तो म्हणतो… ”डॉक्टर साहब, आप सब से बुरे डॉक्टर हों! अगर उस दिन आप मुझसे झूठ नहीं बोलते तो मै उस दिन जिंदाही नहीं रहता!” अर्थात हे सर्व बोलणे त्याचा जीव वाचवल्याबद्दल केलेले कृतज्ञतेचे बोल होते.

एक असाच जखमी सैनिक आला.. पण स्वत:च्या पायाने चालत आला होता… म्हणाला… ”साब, सर में गोली लगी है!” डॉक्टर त्यावेळी आणखी दोन केसेस पहात होते…. ते म्हणाले… ”आप बैठो… आपका तीसरा नंबर… आपके नाम में राम है.. आपको कुछ नहीं होगा!” त्याला वाटलं ज्या अर्थी डॉक्टर मला तिस-या क्रमांकावर बसवताहेत.. याचा अर्थ माझ्या जखमा गंभीर नाहीत… मी उगाच घाबरून गेलो होतो ! खरंच तसंच झालं होतं…. त्याच्या डोक्याला एक गोळी चाटून गेली होती ! डॉक्टरसाहेबांनी त्याला धीर नसता दिला तर तो कदाचित घाबरल्याने आणखीन गंभीर झाला असता!

– क्रमशः भाग दुसरा

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ उल्हास… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? जीवनरंग ❤️

☆ उल्हास… ☆ श्री सुनील शिरवाडकर

दरवर्षी उल्हास ठरवायचा.. पुढच्या वर्षी नक्की दिंडी बोलवायची.. पण मग वर्ष असंच निघून जायचं.. गावात दिंड्या यायच्या.. मुक्काम करायच्या.. एक दिवस थांबून त्र्यंबकेश्वरकडे निघून जायच्या.. उल्हासचं स्वप्न तसंच राहून जायचं.

नासिकपासून पंचवीस तीस किलोमीटर उल्हासचं गाव होतं. उल्हासला नाशिकमध्ये स्थायिक होऊनही पंचवीस वर्षे झाली होती. पण लहानपणीच्या आठवणी मनात रुतुन बसलेल्या असतातच ना!त्याचे वडील वारकरी.. घरात एकादशीचं व्रत.. एकादशीला त्यांचे बाबा पहाटे लवकर उठायचे.. दिड तास त्यांची पुजा चालायची.. त्यांच्या देवघरात एक शाळीग्राम होता.. त्यावर अभिषेक पात्रातुन संततधार चालायची.. उल्हासच्या मनावर ते दृश्य.. ती पुरुषसूक्ताची आवर्तने कायमची कोरली गेली होती.. बाबांची वद्य एकादशीची निवृत्तीनाथांची वारी कधीच चुकली नाही.. ते संस्कार मनात रुजलेले.

पौष महिन्यात त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथांची यात्रा असते. गावागावातुन दिंड्या निघतात.. त्यांच्या गावातुनही दिंडी निघायची.. त्याचं पुढारीपण असायचं उल्हासच्या बाबांकडेच. गावातुन दिंडी निघाली की पहिला मुक्काम असायचा नाशिकमध्ये.

आता बाबा नाही.. पण दिंडी निघते.. नासिकला एक दिवस मुक्काम करते.. उल्हासला वाटायचं.. आपल्या गावची दिंडी नासिकमध्ये आली की ती एखाद्या वर्षी आपल्या सोसायटीत एक दिवस रहावी.. पण हे जमणार कसं?तशी दिंडी काही फार मोठी नसायची.. जेमतेम साठ सत्तर माणसं.. पण एवढी माणसं रहाणार कुठं.. कशी?

डिसेंबरमध्ये उल्हासने सोसायटीच्या चेअरमनशी हा विषय काढला. एक रात्र आपल्या सोसायटीत कार्यक्रम करायचा का?चेअरमनने मिटींग बोलावली.. उल्हासचं म्हणणं मांडलं.. कोणी हो म्हणाले.. कोणी विरोध दर्शवला.. पण हो.. ना करता करता ठरलं..

यावर्षी दिंडी बोलवायची.

उल्हास लगेच पुढच्या रविवारी गावी गेला. दिंडी आयोजित करणारी गावची जी मुख्य माणसं होती.. त्यांना रितसर आमंत्रण दिलं. किती माणसं असणार.. त्यात स्त्रिया किती.. पुरुष किती.. गाड्या किती असणार.. किती वाजता येणार.. परत किती वाजता निघणार.. ही सगळी माहिती जाणून घेतली.

नासिकला आल्यावर पुन्हा एकदा सोसायटीची मिटींग झाली.. कार्यक्रमाची आखणी झाली.. जबाबदार्यांचं वाटप झालं..

पण..

.. उल्हास निश्चिंत झाला नव्हता.. त्याने हा सगळा घाट घातला होता.. दिंडी पण त्याच्या गावची होती.. त्यामुळे हे सगळं व्यवस्थित पार पडेपर्यंत त्याला चैन पडणार नव्हतं.. एक प्रकारचं दडपण त्याला जाणवत होतं.

उल्हासच्या घरी हे सगळं अजिबात पसंत नव्हतं.. कुणी सांगितलेय नसते उद्योग करायला असंच सुषमा वहीनींचं म्हणणं होतं. पण आता नवर्यानी ठरवलंच आहे तर मदत करणं भाग होतं.

सोसायटीच्या आवारात मांडव घालण्यात आला.. केटररशी बोलुन झालं.. मेनू ठरवला.. आणि तो दिवस उजाडला ‌

उल्हासनं गावी फोन लावला.. दिंडी निघाली होती.. संध्याकाळी पाच पर्यंत पोहोचणार होती.. उल्हास ची धावपळ सुरू झाली.. खरंतर आठ दिवसांपासूनच ही धावपळ चालू होती.. दिंडी अजुन यायची होती.. पण तो आत्ताच थकला होता.. नाही म्हटलं तरी त्याची पन्नाशी उलटली होती.

पाच पर्यंत पोहोचणारी दिंडी प्रत्यक्षात सहा वाजता आली.

दुरुनच ज्ञानोबा तुकाराम.. ज्ञानोबा तुकाराम असा आवाज यायला सुरुवात झाली… टाळांचे आवाज कानावर पडुन लागले.. आणि मग उल्हासचा थकवा गायब झाला.

ढगळ पॅन्ट.. आणि चेक्सचा लांब बाह्यांचा शर्ट हा उल्हासचा वेष.. मुलीनं त्याला सुचवलं होतं..

“बाबा तुम्ही मस्त नाडीचं धोतर आणा.. आणि वर लांब कुर्ता.. छानसा फेटापण बांधा.. दिंडीत असतीलच कुणीतरी फेटा बांधणारे. “

पण उल्हासनं ते उडवून लावलं.. त्याला स्वतःला असला शो ऑफ अजिबात पसंत नव्हता. त्याचा आपला नेहमीचाच ड्रेस.. आणि पायात साधी चप्पल.

गेटवर दिंडीचं स्वागत झालं. सत्तर ऐंशी जण होते.. त्यात वीस पंचवीस महिला. मांडवात जाड जाजम अंथरलं होतं.. त्यावर सगळेजण विसावले. स्टीलचा धर्मास, आणि कागदी कप घेऊन चायवाला फिरु लागला.. गेटपाशी माऊलींचा मानाचा घोडा बांधला होता.. त्याच्या पुढ्यात चारा टाकला.

एका लहान ट्रॅक्टरला गाडी जोडली होती.. त्यावर भगव्या पताका फडकत होत्या. ती गाडी सोडवुन आत आणली.. त्यात पालखी होती. पालखीत चांदीच्या पादुका होत्या.. सोसायटीतील लोक जाता येता पादुकांना हात लावून नमस्कार करत होते.. डोके टेकवत होते.

चहापाणी झालं.. किर्तनाची तयारी सुरु झाली.. उल्हासचा पाय एका जागी ठैरत नव्हता.

.. उल्हासभाऊ त्या पाण्याच्या बाटल्या कुठं ठेवल्या?

.. भाऊ तो स्पिकरवाला अजुन आला नाही 

.. भाऊ तो केटरर म्हणतोय.. पुर्या तळुन ठेवलेल्या चालतील का?

जबाबदार्या वाटल्या होत्या.. तरीसुद्धा उल्हासचं लक्ष सगळ्या गोष्टीत होतं..

सात वाजता किर्तन सुरू झालं.. गावातल्या वारकरी शिक्षण संस्थेतील पंधरा बाल वारकरी मागे ओळीत उभे राहिले.. पुंडलिक बुवा म्हणजे गावातले ज्येष्ठ किर्तनकार.. सुंदरसा पांढरा शुभ्र फेटा.. स्वच्छ सदरा उपरणं.. कपाळी विष्णु गंध.. त्यांनी हातात वीणा घेतला.. सुरांवर लावला.. पखवाजावर थाप पडली..

‘जय जय राम कृष्ण हरी’.. मागे उभ्या असलेल्या बाल वारकऱ्यांनी टाळ्यांची साथ दिली..

“नामसंकीर्तन साधन पै सोपे.. जळतील पापे जन्मांतरीची.. “

बुवा निरुपण करता करता रंगुन गेले.. सोसायटीची पंढरी झाली.. अवघं वातावरण विठ्ठलमय झालं..

उल्हासला किर्तन एंजॉय करायचं होतं.. पण असं एका जागी बसून कसं चालेल?पुढची जेवणाची तयारी करायची होती.. साडेआठला कीर्तन झालं.. मग टाळ मृदुंगाच्या तालावर सगळ्यांनी फेर धरला.. काही बायका फुगड्या खेळु लागल्या.. कुणी दोन्ही कान पकडून उड्या मारु लागले..

तोवर पत्रावळी मांडल्या गेल्या.. उल्हास ने तरुण मुलांवर ही जबाबदारी सोपवली होती.. पहीली पंगत वारकऱ्यांची झाली.. मग सोसायटीतले.. रात्री दहा वाजता आपापल्या पथार्या सोडून हळूहळू सगळे झोपी गेले.

पहाटे पाच वाजता दिंडीला जाग आली.. एवढ्या लोकांचं प्रातर्विधी.. स्नान.. आवरणं व्यवस्थित झालं पाहिजे.. लाकडाच्या काटक्या गोळा करून शेगडी पेटवली.. त्यावर मोठी कढई.. कढईत पाणी गरम करून छोट्या छोट्या बादल्यांमध्ये घेऊन कुणी बाथरूममध्ये.. कुणी बाहेरच उभ्या उभ्या डोक्यावरून पाणी घेऊ लागले.

चहाचा थर्मास फिरत होता.. पहाटेच्या गुलाबी थंडीत.. स्पिकरवरुन येणार्या भजनाच्या निनादात वारकरी चहा घेत होते.. सगळा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पडला होता. बांधाबांध झाली.. कानावर टोप्या चढल्या.. मफलरची गाठ घट्ट झाली.. पालखी मधील पादुकांचे पूजन झाले..

एकामागून एक गाड्या निघाल्या..

‘हेची दान देगा देवा.. तुझा विसर न व्हावा’

ट्रॅक्टरवर असलेल्या दोन स्पिकरमधुन येणारा आवाज दुर दुर जाऊ लागला.. त्या भगव्या पताका… पाठमोरे वारकरी नजरेआड होत गेले.. उल्हासनं पाहीलेलं एक छोटंसं स्वप्न पुरं झालं होतं..

आपल्या बाबांच्या आठवणीने त्याला एकदम गलबलून आलं.. वर आकाशाकडे पाहत त्याने हात जोडले.. भरल्या डोळ्यांनी तो घराकडे वळला.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “हॅप्पी व्हॅलेंटाईन डे …” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

☆ “हॅप्पी व्हॅलेंटाईन डे …” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

” अगं नातवाचं लग्न ठरलं खुश आहेस ना.. मग आता घे तुला एखादी चांगली पैठणी”

” अगोबाई माझ्यासाठी एकदम पैठणी.. आज राजा बराच उदार झालेला दिसतोय”

“तसं नाही ग.. एक जुनी गोष्ट आठवली. कुणाचंही लग्न असलं की बरीच वर्षे तु तो लग्नातला शालूच नेसत होतीस… त्यावरून कोणीतरी तुला बोललं होत…. तर घरी येऊन किती रडली होतीस. माझ्या ते कायम लक्षात आहे.”

“जाऊदे हो.. पूर्वीच ते सगळं विसरले. तेव्हा नव्हती आपली ऐपत.. आहे त्यात भागवत होतो… आपल्याला कुठे नव्या साडीचा खर्च झेपणार होता?”

” हो ग साध्या दोन खुर्च्या घ्यायच्या म्हटलं तरी किती विचार करत होतो आपण..”

” ओव्हरटाईम करून त्या पैशातून अचानक तुम्ही स्टीलच्या एक डझन मोठ्या प्लेट आणल्या होत्या. भिशीला मी त्या काढल्या तेव्हा सगळ्याजणी चकित झाल्या होत्या”

” तुझ्या अजून ते आठवणीत आहे…. त्या प्लेट घेऊन घरी येताना त्या बघून तू किती खुश होशील हेच माझ्या मनात होतं”

“आता ती गरिबी वाटते. पण तेव्हा त्याचं काही वाटायचं नाही. आहे त्यात भागवत आपण आपला संसार हसतंखेळतं सुखाचा केला…”

” पहिल्यांदाच आपण केलेली हाॅटेलात रहायची अशी तीन दिवसांची कोकणातली ट्रीप आठवते का? समुद्र बघून तुला किती आनंद झाला होता….”

” हो तर… माझ्या सगळं लक्षात आहे नंतर परदेशातही जाऊन आलो. पोरं शिकली भरून पावलो….”

त्या सुखद आठवणीनी डोळे डबडबलेच… आजकाल असंच व्हायचं…

जरा काही जुन्या आठवणी आल्या की रडूच यायचं…..

” तू पहिल्यांदा इडली केलीस आणि कुकरला शिट्टी तशीच राहिली त्या कडक इडल्या आठवतात का?”

यावर मात्र रडता रडता ती हसायला लागली…

” तरी म्हटलं बाबा अजून बोलला कसा नाही… अहो नंतर शिकले की सगळं. हॉटेल सारखे डोसे करून घातले. पिझ्झा बर्गर पण शिकले. ते बरं आठवत नाही…..”

नाही म्हटलं तरी आवाज जरा तापलाच तिचा….

” अगं जरा थट्टा केली तुझी… लगेच काय चंडीकेचं रूप धारण करायला नको……”

” मी पण गंमत केली हो तुमची…. अहो उद्या तर काय म्हणे तो प्रेमाचा दिवस व्हॅलेंटाईन डे आहे”

” अग तू हे एकदम व्हॅलेंटाईन डे वगैरे सांगतेस मला आश्चर्यच वाटते आहे”

” अहो पेपरात त्याचं बातम्या आहेत. गुलाब खूप महाग झाले आहेत असं पण लिहिलं आहे”.

” अग आपल्याला हे असे प्रेमाचे दिवस साजरे करावेच लागले नाही. एकमेकांची काळजी, माया, मनाची जपणूक, समजून घेणं, एकमेकांचा आदर करणे.. हीच आपली प्रेमाची व्याख्या होती.”

“हो… हे मात्र खरं…. कितीतरी वेळा तुम्ही मला सांभाळून घेतलंत.. आधार दिलात… संकटप्रसंगी माझ्यामागे खंबीर उभे राहिलात… आपल्या वेळेस असे गुलाब नव्हते. कधीतरी ऑफिसातून येताना तुम्ही गजरा आणला तरी पण मन मोहरून जायचं… खरं सांगू का म्हणूनच मी आत्ता शांत आहे..”

बोलता बोलता तिचे डोळे भरूनच आले…

तेवढ्यात मुलगा आला म्हणाला,

” अग आई झालं का विष्णू सहस्त्रनाम म्हणून? रात्र झाली आता.. झोप ना..”

” अरे हो का… बराच वेळ झाला कळलंच नाही रे झोपते”

बेडरूममध्ये आल्यानंतर मुलगा बायकोला म्हणाला,

” हल्ली आईचं काय झालंय कळत नाही खूप वेळ रात्री देवाचं म्हणतं बसते”

” हो ना… पूर्वी दिवसा म्हणत असत.. बाबा गेल्यानंतर आता हे रात्री स्तोत्र म्हणणं का सुरू केलं आहे… हे कळत नाही…”

मुलांना कधीच ते कळणारही नव्हते.

ती आज थोडी हळवी झाली होती. पण नवऱ्याशी खूप वेळ गप्पा झाल्याने तृप्त समाधानी होती.

त्यानी बोललेले शब्द हे नुसते हवेत विरलेले नव्हते… ते अंतःकरणापासून म्हटलेले निखळ.. सच्चे होते. त्यात सहज असं प्रेम होतं. त्यामुळेच हृदयाच्या खोल कप्प्यात तिने ते शब्द जपून ठेवले होते. अशीच कधीतरी आठवण काढून ती त्याचा पुनःपुन्हा आनंद घ्यायची…

 त्याच्यावरच तर ती जगत होती…

नाहीतरी भाळणं काही दिवसांचं असतं सांभाळणं मात्र आयुष्यभरासाठी असतं…..

म्हणूनच लांब गेला तरी तीच्या जवळच होता ना तो……. अगदी आत्ताही….

असाही असतो कधीही साजरा होणारा व्हॅलेंटाईन डे…..

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “लोखंड्या…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ लोखंड्या… ☆ प्रा. भरत खैरकर 

लोखंड्या, आपल्या गल्लीमध्ये, गळपु-यात कधीच चोरी करायचा नाही.. तो कुणाच्या धाकदपटशाला ऐकणारा नव्हता. तो पक्का चोर होता. पण चोरी आपल्या एरियात काही करायची नाही. रिस्पेक्टफुल राहायचा, मानाधनाने राहायचा.. गावातले सारे त्याला लोखंड्या म्हणायचे! पंधरा सोळाव्या वर्षांपासून चोरी केल्यामुळे पोलिसांनी पकडून पकडून त्याला कित्येकदा मारमार मारले होते. पण तो लोखंडासारखा मजबूत आणि निगरगट्ट झाला होता. पोलिसांनी मारून मारून त्याचे समोरचे दात पाडून टाकले होते. इतका तो मार खायचा! त्याचं नाव एरियामध्ये लोखंड्या असंच पडलं होतं.. वास्तविक त्याचं नाव अशोक होतं. पण पुढे जाऊन त्याला ‘असक्या’ किंवा अटक होते म्हणून ‘अटक्या’ असेही त्याला म्हणायचे..

असक्याची अंगकाठी दादा कोंडके सारखी होती.. तो दिसायलाही बराचसा तसाच होता.. त्याची कटिंग अगदी दादासारखीच.. चेहरा मात्र थोडासा रुंद होता.

आजीच्या घराला लागूनच त्याचं घर होतं.. आजीच्या घराच्या जाळीच्या खिडकीतून लोखंड्याचं घर आरपार दिसायचं. पण उलट्या बाजूने बघितल्यावर मात्र काहीही दिसायचं नाही. फक्त कोणीतरी उभा आहेस वाटायचं. त्यामुळे लोखंड्याच्या घरी काय चाललं आहे? हे सगळं दिसत होतं.. पण आजी खिडकीत उभे राहू द्यायची नाही. ‘काय त्या चोराचं घर बघायचं?’ म्हणून ती रागवायची! आमच्या खिडकीतून.. त्याची खिडकी आणि पुढचं भलं मोठा अंगण.. असं सगळं आरपार घर दिसायचं!

ज्या दिवशी त्या अंगणात गहू सुकायला टाकले.. त्यादिवशी समजायचं याने रात्री कुणाच्यातरी गव्हावर हात मारला, जेव्हा केव्हा तुरी पसरलेल्या दिसल्या तर समजायचं लोखंड्यानं रात्री कुठेतरी डाळ शिजवली!

आजूबाजूचे शेजारी असक्याकडून हा माल विकत घ्यायचे.. कमी किमतीत हा माल मिळायचा. आणि लोखंड्याही तो साठवून ठेवणे परवडायचं नाही!

कंट्रोलचे गहू घेण्यापेक्षा किंवा ते दुसरीकडे विकून असक्याकडून हे धान्य घ्यायला शेजाऱ्यांनाही परवडायचं!

खिडकीतून पलीकडचं सगळं दिसायचं.. पण आजी खिडकीमध्ये जावू द्यायची नाही. चुकून जर आजीला दिसलो की आपण पलीकडे असक्याच्या घरात बघत आहो तर आपली शामत आली म्हणून समजायची!

तो घराला वर्षातून कितीदा पेंट करायचा माहिती नाही.. कुठून बिचारा एवढे पेंट आणायचा माहित नाही.. दर महिन्याला त्याच्या घराला नवीन रंग दिलेला असायचा.. घर एवढं टापटीप असायचं की कोणीही हे चोराचं घर आहे असं म्हणणार नाही. येऊन जाऊन तो घराला सारखा पेंट करायचा.. घर अगदी चकचक दिसायचं.. महिना दोन महिन्यात घराचा रंग बदललेला असायचा..

त्याच्या घराच्या आतील जिना वेडावाकडा होता म्हणे.. जेणेकरून पोलीस आल्यानंतर त्यांना चकमा देऊन त्याला पळता यावं! त्याने तो स्पेशली बनवून घेतला होता. एकदा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पोलिसांनी त्याला सर्व मोह्हल्यामध्ये वरात काढून चांगला फोडून काढला होता! गावात काहीही झालं तरी पहिला टारगेट लोखंड्याच असायचा!

मात्र तोही इतका अट्टल गुन्हेगार होता की सगळ्या वस्तू तो जागच्या जागी रफादफा करायचा.. ह्या कानाची त्या कानाला खबर नाही लागू द्यायचा.. मात्र एरियातील लोकांना माहिती होतं.. ते बऱ्याच वेळा दहशती खाली राहायचे.. कारण हा शेतातीलही उभं पिक रात्री बेरात्री जाऊन कापून आणायचा. त्याच्या भीतीने काहीही कारण नसताना लोक शेतावर जागलीसाठी जायचे! तो अट्टल चोर होता.. रात्री त्याची सायकल वाजली.. की आजी म्हणायची, ” निघाला असक्या ड्युटीवर!”

रात्री चोरून आणलेल्या कोणत्याही मशीन, सायकली, शेतावरचे मोटर पंप, इत्यादी रात्रीच खोल खोल करून रफा दफा करण्यामध्ये लोखंड्याचा हातखंडा होता. कुऱ्हाडी, फावडे, सब्बल, लोखंडी सळ्या, मिळेल तो भंगार त्यातलं काहीही त्याला चालायचं.. रात्रभर त्याच्या घरामध्ये खुळ खुळ खुळ खुळ असा आवाज यायचा. रात्री बारा एक वाजता आणलेला माल पहाटेपर्यंत तोडताड करून व्यवस्थित विल्हेवाट लावण्याचे काम चालायचे.

तो कधीकधी रात्र- रात्रभर लाकडं तोडत राहायचा.. आरा मशीन वरून चोरलेले मोठमोठे लाकडाचे ओंडके.. तो छोट्या छोट्या तुकड्यात तोडून सरपण म्हणून भरून ठेवायचा ! त्याच्या घराच्या टीनावर भरपूर सारा माल पडलेला असायचा.. जोवर विकायचा जुगाड जुळत नाही.. तोवर त्या वस्तू त्याच्या गच्चीवर पडलेल्या असायच्या.. त्याही फक्त तीन-चार दिवस!

रात्री एकेक वाजता तो टेम्पो बोलावून लाकडं आणि त्या वस्तू रफादफा करायचा.. कुठे पाठवायचा माहित नाही.. पण त्याचा ठरलेला टेम्पोवाला होता.. मागील पंधरा-वीस वर्षापासून त्याचा हाच व्यवसाय होता. आजी त्याच्या आईला म्हणायची “लहानपणी याचे कान टोचले असते, तर असा असक्या निपजला नसता.. “पण आता उपयोग नव्हता. “लहाणपणी वस्तू चोरून आला होता तेव्हा तू मारलं नाही आता रडून काय उपयोग ?असं आजी त्याच्या आईला समजावायची.. पण चोरीच्या भरोशावर त्याने आपल्या बहिणीचं लग्न केलं.. स्वतःचं लग्न केलं.. घर चालवतो म्हटल्यावर त्याची आई पण त्याला काही बोलायचे नाही…

त्याच्या घरी कोणी आल्यावर असं म्हणणारच नाही की ‘हे चोराच घर आहे. ‘इतकं सुंदर घर त्याने ठेवलं होतं. घर जुनच होतं वडिलोपार्जित.. पण इतका चकाचक ठेवायचा की आपण कल्पना करू शकत नाही.

कोणत्याही लग्न समारंभात गेल्यानंतर इतका अपटूडेट आणि खाटखूट जायचा.. की कोणी संशय घेऊ शकणार नाही.. दाढी, कटिंग एकदम खटाखट, एकदम पॉश आणि टॉप टीप असे त्याचे कपडे असायचे. तो जेवण बी करायचा आणि हात बी मारायचा! पण त्याच्या पेहरावावरून कोणीही त्याच्यावर आरोप करू शकत नव्हते.. हे सर्व कार्यक्रम तो शेजारच्या गावांमध्ये करायचा.. आजी बरोबर ओळखायची की “आज असक्यान कुठेतरी डाव मारला!”

आता लोखंड्या थकला आहे.. नातू पणतू झाले आहेत त्याला.. ईवाया -जावयाचा झाला आहे तो. शरीरही आता त्याला साथ देत नाही.. आणि आता तसली कामही त्याला शोभत नाही.. अलिकडे दिवस-रात्र तो चंडीकेच्या मंदिरात पडलेला असतो.. आयुष्यभर केलेल्या चुकांची माफी देवीच्या दारात मागत असतो आणि तिच्यात पायऱ्यांवर आपला जीव जावा अशी त्याची इच्छा आहे..

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तृप्ती ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ तृप्ती ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

“आजी हे घे पटकन चटका बसतोय मला “ म्हणत चिमणीने आपल्या इवल्याश्या तळहातावर आणलेले गरम दोन भजे झेलत झेलत आजीच्या शॉलमधून आत टाकले आणि आजीने ते शॉल डोक्यावर घेत मुटूमुटू खाऊन घेतले,.. आजीचा मघाचा चेहरा आणि आताच्या चेहऱ्यात एकदम बदल जाणवला आणि हे सगळं बघितलेलं रमाबाई हसून म्हणाल्या, “आजी भाज्यांनी काय औषधांच काम केलं का,.. ?”तिच्या या प्रश्नावर तिला हळू बोल असे दटवत आजी खुसफूस करत म्हणाली, “रमे वीट आला आहे त्या कडूझर औषधांचा आणि त्या मिळमिळीत जेवणाचा,.. जिभेला असं थोडंस चमचमीत किंवा आवडीचं खावे वाटतं ग,.. पण इथे तर काळजीच्या नावाखाली पार तोंड बंद केलं आहे आमचं,.. बोललं तर राग येईल ह्या लोकांना,.. आता 80 वर्षाची मी मला ह्यांच्या संसारात काही जागा नाही,.. एरवी अडगळ होऊन जगते,.. मग खाऊन मेले मी तर बिघडलं कुठे पण ही लोकं औषध देऊन आणि ते आळणी अन्न खाऊ घालून बळजबरी जगवत ठेवत आहेत मला,.. त्यांचा अगदीच जीव नाही असं नाही ग पण वीस वर्षांपूर्वी रक्तातात साखर काय सापडली,.. सगळ्यांनी माझी पुरणपोळी बंद केली,.. अग मी चालून फिरून करत होते की सगळं मेंटेन पण उगाच बाऊ करून सूनबाईंनी माझ्या गोडावर बंधनं घातली,.. आधी वाटलं काळजी आहे त्यांना पण प्रत्येकवेळी नको त्रास होईल ह्या भीतीने घास काढून घेतला,.. हळूहळू मी मान्य करत गेले पण वय वाढायला लागलं आणि माझ्यातल लहान मुल जाग झालं,.. तिकडे भजे, समोसे तळले की इकडे तोंडाला पाणी सुटत ग,.. वासना वाईटच ग पण माणूस जोडलाच आहे ना वासनेशी,.. मग कसं जमवायचं सगळं,.. बर माझ्याच घरात आहे का असं तर नाही माझ्या मैत्रिणी तेच सांगतात,.. परवा त्या जोशीचा फोन आला,.. तिच्या नवऱ्याला आंब्याचं फार वेड,.. आंबा सिझन आला की रसाशिवाय जेवण करत नव्हता,.. पण ह्या चार वर्षात पॅरॅलीसिस ने अंथरुणावर पडला,.. मग सून आणि मुलांनी काही आंबा खाऊ दिला नाही,.. तुम्हाला त्रास होईल म्हणे,.. बिचारा मरताना आंबा हा शब्द उच्चारत गेला ग,.. मी म्हणते दिला असता अर्धी वाटी रस तर काय बिघडलं असत का,.. ?शेवटी हगण मूतं करायला माणूसच लावलाय ना,.. झाले असते दोन जुलाब जास्त,.. दोन हगीज जास्तीचे गेले असते,.. पण तृष्णा तर पूर्ण झाली असती ना,.. मी मात्र आता चिमणीला धरलं आहे हाताशी,.. आणि अति खाऊ नाही हे मलाही कळतंय की पण,.. त्या चावट जिभेला कोणी सांगावं,.. ती म्हातारी झाल्यावर जास्त त्रास देते बहुतेक,.. आणि तिला हे नाक साथ देत ना ग,.. आता मला सांग आयुष्य गेलं त्या स्वयंपाक घरात,.. तिखट, मसाले, अश्या अनेक चवीने स्वयंपाक केला,.. खाल्ला, खाऊ घातला त्या अन्नातून एवढ्या सहज मन कसं बाहेर पडेल,.. बरं खायचं काही खुप नसतं उगाच त्या वासाने चाळवळलेल्या भुकेला शमवायचं असतं बस,.. पण ही लोकं मऊ भात, खिचडी आणून देतात ना त्यावर लोणचं ना काही,.. आणि बाऊ एवढा,.. त्यांची तब्येत बिघडेल,.. मला तर अस्सा राग येतो पण आता चिमणी आली ना कामी मग मी ही झाले आता लबाड,.. हा हा म्हणत आजीने आपलं बिनदाताच बोळकं पसरवलं आणि चिमणीला टाळी दिली,.. चिमणी हसली आणि म्हणाली, ” चल बाय अज्जू अभ्यास आहे मला,.. आणि पळाली,.. “

आजी मग औषध घेऊन अलगद आपली खाली सरकून झोपली,.. रमाबाईने त्यांच्या अंगावरची शाल नीट केली,.. ते करताना रमाबाईला एकदम गहिवरून आलं,.. मागच्या पौर्णिमेला घरात कुळाचार झाला होता,.. आजी आपल्याला म्हणत होती रमा पुरणाच्या पोळीचा तुकडा आणून दे ग चोरून,.. पण आपण नाहीच म्हणालो,.. “सुनांना मागितलं तर सुनांनी लगेच कांगावा केला,.. लेकही अंगावर धावले,.. बिचारी आजी गप्प बसली,.. चिमणी नेमकी ट्रीपला गेली होती,.. आजीला पुरणपोळी खुप आवडते असं नेहमी म्हणतात त्या,.. हे सगळं आठवून रमा गहिवरली होती,.. दुसऱ्या दिवशी रमा छोट्या डबीत काहितरी घेऊनच आली होती,.. आजीची खोली झाडेपर्यंत दार लावते म्हणत तिने आजीला पटकन डबीतून अर्धी पोळी आणि त्यावर तूप असं खायला दिलं,.. आजीला आंनद गगनात मावेना,.. किती किलोच पुरण घालायचे ग मी,.. सगळयांना वाटायचे,.. एवढं म्हणत आजीला रडू फुटलं,.. रमाने डोक्यावर हात फिरवला,.. रडू नका,.. घ्या खाऊन,.. आजी एक एक घास खाताना डोळे बंद करून अगदी तृप्तपणे खात बसली होती,.. रमाला मनातून आंनद झाला,..

दुसऱ्या दिवशी रमा आली तर सूनबाईची तणतण सुरू होती आजीला,.. “जरा दम धरायचा ना पातळ खराब केलं ना,.. आजी अगदी अपराधी होऊन ऐकत होती,.. पण रमाने सावरलं,.. “असू द्या मॅडम मी आवरते सगळं,.. जा तुम्ही,.. आजीचे डोळे भरून आले म्हणाली, “माझ्या हवरट पणाचा रमा तुला त्रास ग”,.. रमा म्हणाली, “आजी काही वाईट वाटून घेऊ नका,.. ह्याचेच पैसे घेतो आम्ही,.. त्यात कसला त्रास… उद्या तुम्हाला आवडणारे मुगाचे लाडू आणते नक्की,.. “

आजी म्हणाली, “आता आवड निवड अशी नाही ग पण काय माहित ह्या जीवाला कशी ही अन्नाची तृष्णा लागते,.. फार नाही पण अगदी घासभर का होईना खाव वाटतं.. रमाबाई निघाली,.. आजी म्हणाली, “रमा, ह्याला तू हवरटपणा समज की काहिही पण तू असे वयस्कर लोकांना सांभाळायचे काम करते म्हणून सांगते,.. जे आमच्यासारखे अगदी जाण्यासारखे आहेत,.. त्यांना खाण्यासाठी तरसु देऊ नकोस ग,.. ह्या देहाचे हे खेळ कळत नाही कधी कधी त्या वासनेत जीव अडकून बसतो ग,.. जा बाई अंधार पडलाय ये उद्या,.. “

रमा निघाली रात्री झोपेत आजी स्वप्नात आली,.. “मुगाचा लाडू आणते म्हंटली ह्याने सुद्धा जीव तृप्त झाला ग रमे,.. “रमा दचकून उठली पहाटेचे पाच वाजले होते,.. तेवढयात मोबाईलवर रिंग वाजली,.. आजीच्या घरून फोन,.. तिने पटकन उचलला,.. आजीची सुनबाई रडत बोलत होती,.. आजी गेल्या रमाबाई,.. जरा मदतीला या लवकर म्हणत फोन ठेवला.. रमाला गहिवरून आलं,.. रात्री ओट्यावर काचेच्या बरणीत बांधून ठेवलेले लाडू देखील रडत होते,.. जणू काही तृप्ती राहिली हे सांगत होते,.. पण स्वप्नातलं आजीचं वाक्य रमाला आठवलं,.. तृप्ती झाली ग रमे… हे सगळं आठवून रमाला अधिकच रडू फुटलं,.. “

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

फक्त व्हाट्सअप संपर्क +91 93252 63233

औरंगाबाद

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सातारकरची शाळा – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ सातारकरची शाळा – भाग-३  ☆ श्री प्रदीप केळूसकर

(या भागातील सुद्धा अनेक तरुण लांबच्या गावात जाऊन तिचे तमाशे पाहत होते. माधवी पाटील हिचा तमाशा गावात होणार म्हणून गावात मोठ्या उत्साहाचे वातावरण होते.) – इथून पुढे —

शेवटी जत्रा जवळ आली. देऊळ माणसांनी भरले होते. लांब लांब चे नातेवाईक या गावात आले होते. छोटी छोटी अनेक दुकाने देवळा भोवती लागली होती. देवीच्या देवळात मोठी गडबड होती. देवीचे मानकरी नवीन कपडे घालून मिरवत होते. तरुण आणि वृद्ध लोक सर्वच माधवी पाटीलच्या तमाशासाठी आसुसले होते.

जत्रा सुरू झाली, देवीची पालखी घरोघरी गेली. बाया बाप्याने देवीची ओटी भरली. रात्री देवळासमोरच्या पटांगणात माधवी पाटील तमाशा सुरू झाला.

“कोन्या गावाचं आलं पाखरू, बसलंय डोलात,

खुदु खुदु हसतंय गालात ‘.

गावकरी बेभान झाले होते, फेटे उडवीत होते. टोप्या फेकत होते. तमाशा कार्यक्रम हाउसफुल्ल होता.

जत्रा संपली, तरी माधवी पाटीलच्या तमाशाची चर्चा घरोघरी सुरू होती. यावर्षी जत्रा कमिटीला पाच लाखापेक्षा जास्त नफा झाल्याचे बोलले जात होते.

सातारकर ना पण समजले, यावर्षी जत्रा कमिटीला पाच लाखापेक्षा जास्त रक्कम मिळाली, ही रक्कम आपल्या शाळेसाठी मिळाली तर, वरच्या वर्गातील मुलांच्या हातात टॅब देण्याचे आपले जे स्वप्न आहे ते पुरे होऊ शकेल. पण हे पैसे मिळवायचे कसे?

सातारकरांचे सौदागर काकांशी आणि यशोदेच्या आईशी याबाबत बोलणे झाले.

सौदागर काका – जत्रा कमिटी तसे ते पैसे देणार नाही. कारण या पैशातून त्यांना अख्या गावाला मटन आणि दारूचे जेवण द्यायचे असते. शिवाय पुढच्या वर्षीच्या तमाशाची पण तजवीज करायची असते. त्यांना मुलांची एवढी काळजी कुठे?

सातारकर – यासाठी आपण एक वेगळी आयडिया करूया. वहिनी, तुम्ही ग्रामपंचायतीतर्फे हळदी कुंकू कार्यक्रम घ्या. गावातील सर्व महिलांना या हळदीकुंकू कार्यक्रमासाठी बोलवा. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौदागर काकांना बोलवा. सौदागर काका आपल्या भाषणात आपल्या गावातील शाळेतील वरच्या वर्गातील मुलांसाठी कॉम्प्युटर शिक्षण अत्यंत आवश्यक आहे हे पटवून सांगतील. आणि त्यासाठी यावेळी पासून मुलांना टॅब देण्याची गरज असल्याचे बायकांना पटवतील. यासाठी सुमारे चार लाख रुपये ची गरज असल्याचे सांगतील. आणि महिलांना सांगतील हे चार लाख रुपये जत्रा कमिटीकडे जमा असलेल्या पैशातून जर मिळाले तर हे शक्य होईल. प्रत्येक बाईने जर आपल्या घरात आपल्या नवऱ्याच्या मागे हट्ट धरला, तर हे पैसे आपल्याला मिळू शकतात. सौदागर काकांना ही कल्पना आवडली. यशोदेच्या आईने ग्रामपंचायतीतर्फे हळदीकुंकू आयोजित केले. गावातील प्रत्येक घरात जाऊन आमंत्रण दिले. गावातील सर्व स्त्रिया नटून थटून हळदीकुंकवासाठी आल्या. हळदीकुंकू दिल्यानंतर प्रमुख पाहुणे सौदागर काका बोलू लागले ” या गावातील माझ्या बहिणींनो, गेली चार-पाच वर्षे सातारकर नावाचे शिक्षक आपल्या शाळेत आल्यापासून आपल्या शाळेची प्रगती तुम्ही पाहत आहात. त्यावेळी शाळेत दहा मुले होती ती आता 600 च्या वर मुले गेली. स्कॉलरशिप परीक्षेत आपली मुले उत्तीर्ण झाली. ड्रॉइंग परीक्षेत आपली मुले चांगले यश मिळवीत आहेत. आपल्या शाळेसाठी नवीन इमारत उभी राहत आहे. आजूबाजूच्या गावातील सुद्धा अनेक मुले आपल्या गावातील शाळेत येत आहेत. सध्या सातवीपर्यंत वर्ग आहेत, पुढील वर्ष आठवीचा पण वर्ग सुरू होणार आहे. नवीन नवीन शिक्षक या शाळेत येणार आहेत. आता काळानुसार मुलांना कॉम्प्युटर शिक्षण आवश्यक झाले आहे. तुम्ही शहरात गेल्यावर पाहिला असाल बँकेत पोस्टात सर्व ठिकाणी आता कॉम्प्युटर शिवाय काम होत नाही. म्हणून आपल्या मुलांनी एवढ्या पासूनच कॉम्प्युटर शिकणे आवश्यक आहे. पुढच्या काळात कॉम्प्युटरमुळेच नोकऱ्या मिळणार आहेत. आपल्या मुलांनी शहरातल्या मुलांपेक्षा मागे पडता नये असे तुम्हाला वाटत असेल, तर आपल्या मुलांच्या हातात टॅब असणे आवश्यक आहे. ‘

काकांनी आपल्या घरातला टॅब हळदी कुंकवासाठी आलेल्या बायकांना दाखवला.

“हा असा टॅबो मुलांच्या हातात असला, म्हणजे मुले दिल्लीतील मुंबईतील सुद्धा क्लास करू शकतात. या गावातून देशा प्रदेशातील तज्ञांची बोलू शकतात. शेती विषयी सुद्धा माहिती मिळू शकतात. याकरता यावेळी पासून या मुलांना टॅब मिळणे आवश्यक आहे. याकरता सुमारे चार लाखाची गरज आहे. आपल्या गावातील जत्रा कमिटीला यंदाच्या तमाशातून सुमारे पाच लाख रुपये मिळाले आहेत. त्यातील जर चार लाख शाळा कमिटीला मिळाले तर मुलांसाठी टॅब घेणे सोपे जाईल. याकरता माझ्या बहिणींनो, तुम्ही प्रत्येकाने आपल्या नवऱ्याच्या मागे हट्ट करायचा की जत्रेमध्ये मिळालेले पैसे शाळा समितीकडे द्या. मला खात्री आहे तुम्ही हट्ट केला म्हणजे तुमचे नवरे तुमच्या हट्ट पेक्षा लांब जाऊ शकत नाही. आणि आपले टॅब घेण्याचे काम होईल. ‘

सर्व बायका आपापल्या घरी गेल्या. गावातील सुनंदाताई आपल्या नवऱ्याशी वाद घालू लागल्या “एवढं पैस जमा झालया, द्या की ते पोरांसाठी, का अजून बाई नाचोंवायची हाय ‘.

सुमनताई नवऱ्यासमोर कडाडल्या ” बाईला नाचवून पैस जमा केल्या न्हवं, न्हाई शाळ साठी दिल तर माझ्याशी गाठ हाय ‘.

यमुनाताई टोमणेच मारत होत्या ” सातारकर गुरुजी शालसाठी एवढं रबत्यात, त्याच हाय काय जीवाला, पैस जमीवलं ते दारू मटण खण्यासाठी, पोरांसाठी करा की खर्च’. सगळा पुरुष वर्ग वैतागला,

सर्वांच्या घरात तीच परिस्थिती, जो तो बायकोला तोंड देता देता कंटाळला. शेवटी गावातले सगळे पुरुष एकत्र आले आणि शाळा कमिटीकडे चार लाख रुपये देण्याचे ठरवले. सौदागर काकांकडे चार लाख रुपये आले. शहरातील एका कंपनीकडे पंचवीस टॅब ची ऑर्डर दिली गेली, आणि मुलांच्या हातात टॅब आले. मुलांना कॉम्प्युटर शिकवायला शेख बाई होत्याच.

सातारकरांच्या मनात आले, आपण या गावात आलो तेव्हा शाळेचे वर्ग म्हशीच्या गोठ्यात भरत होते. 10 11 मुले जेमतेम होती. आता शाळेसाठी स्वतंत्र बिल्डिंग तयार होते आहे. आठ वर्ग बांधून होत आहेत, गरज पडली तर अजूनही बांधण्याची तयारी आहे, आपण आलो तेव्हा एक एकच शिक्षक होतो, आता सहा शिक्षक आले आहेत, सर्व शिक्षक आपल्या हाताखाली तयार झाले आहे. सौदागर काकांचे त्यांना मार्गदर्शन आहे. स्वतः सौदागर काका आणि काकू शाळेत काही तास घेत आहेत. मुलांची प्रगती आहे. आता या शाळेची अशीच प्रगती होत राहणार. यापुढे या शाळेतील मुले एसएससी परीक्षेत चांगले यश मिळणार. आपले आता इथले काम संपले. आपण आता दुसऱ्या गावात जावे. जिथे आपली गरज असेल तेथे जावे.

सातारकर शिक्षणाधिकाऱ्यांना भेटले. सातारकरांवर शिक्षणाधिकारी खुश होतेच. मुलांच्या हातात टॅब देणारी पहिली शाळा होती सातारकरांची. शिक्षणाधिकारी सातारकराना म्हणाले ” आठवीच्या मुलांच्या हातात टॅब देणारी ही पहिली सरकारी शाळा आहे, जिचा नावलौकिक देशात नव्हे परदेशात सुद्धा वाजू लागला आहे. लवकरच या शाळेला परदेशी शिक्षण तज्ञ सुद्धा भेट देणार आहेत. या शाळेला परदेशातून सुद्धा मोठ्या मोठ्या देणग्या मिळतील.

“हो सर, मला कल्पना आहे या शाळेचे भवितव्य उज्वल आहे. पण माझी आता या शाळेला गरज नाही. जेथे माझी गरज आहे तेथे माझी बदली करावी. असे गाव शोधावे येथील मुले अजूनही शाळेत जात नाहीत, पालकांना मुलाच्या अभ्यासाबद्दल काही वाटत नाही, तेथे मला नवीन आव्हान घ्यावयास आवडेल.

शिक्षणाधिकाऱ्यांनी सातारकरांच्या विनंतीचा मान ठेवला, 50 किलोमीटर वरील दुसऱ्या तालुक्यातील टोकाच्या गावात त्यांची बदली केली.

सातारकरांची बदली झाली हे गावात कळले, गावातील पालक त्यांना विनंती करू लागले, हे गाव आणि ही शाळा सोडून जाऊ नका म्हणून. पण सातारकर ठाम राहिले, पालकांनी सौदागर काकांना त्यांची समजूत व घालायला सांगितले. पण सौदागर काका म्हणाले ” सातारकरांचे बरोबर आहे, जेथे गरज आहे तेथे त्यांना जाऊ दे, त्यांचा सारखा शिक्षक ज्या गावात जाईल, तेथे विद्यार्थी जमतील, शाळेची आणि शिक्षणाची भरभराट होईल ‘. आपल्या गावचे नशीब सातारकर आपल्या गावात पाच सहा वर्षे राहिले याचे. ‘

सर्वांचा निरोप घेऊन सातारकर निघाले, त्यांना निरोप देण्यासाठी अख्खे गाव एसटी स्टँडवर हजर होते. शाळेतील सहाशे मुले आठ शिक्षक आणि गावातील लहान-मोठे सर्वजण. बायका डोळ्याला पदर लावत होत्या, पुरुष मंडळी डोळे हळूच पुसत होते. स्वतः सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पण हजर होते.

सर्वांना एकदा नमस्कार करून आणि सौदागर काकांच्या पायांना नमस्कार करून पाच वर्षांपूर्वी आणलेल्या दोन पिशव्या घेऊन सातारकर एसटी चढले.

— समाप्त — 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सातारकरची शाळा – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ सातारकरची शाळा – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(सौदागर काकांनी शाळेची नवीन इमारत होईपर्यंत आपली जागा फुकट वापरायची परवानगी दिली. एका महिन्यात शाळा सौदागर काकांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या बिल्डिंगमध्ये आली.) – इथून पुढे —–

आता रोजच सातारकर आणि सौदागर काका एकमेकांना भेटत होते, यशोदेची आई सुद्धा अधून मधून तिथे येत होती, एक दिवस सातारकर सौदागर काकांना म्हणाले

सातारकर – काका, तुमच्याकडे एवढी वर्तमानपत्र येतात पुस्तके आहेत अंक येतात, माझी अशी इच्छा आहे की दर शनिवारी मुलानी शाळे ऐवजी इथेच तुमच्या घरी जमावे. तुम्ही मुलांना पुस्तकांबद्दल वर्तमानपत्राबद्दल सांगावे. गोष्टी सांगाव्या. मध्ये मध्ये मी किंवा यशोदेची आई पण त्यांना कथा गोष्टी सांगेल. अशामुळे मुलांना पुस्तकाबद्दल आणि वाचनाबद्दल आस्था निर्माण होईल.

सौदागरकाका – हे फारच चांगले, मला पण मुलांना कथा गोष्टी सांगायला आवडतात, आणि त्यामुळे मुले माझ्या घरी येतील.

पुढील शनिवारपासून शाळेतील मुले आणि सातारकर सौदागर काकांच्या घरीच जमू लागले. सौदागर काकांनी मुलांना विवेकानंदांच्या गोष्टी सांगितल्या. गांधीजींच्या गोष्टी सांगितल्या. सातारकर बाल शिवाजी पासून शिवाजी महाराजांच्या सर्व कथा मुलांना सांगायला लागले. यशोदेची आई रामायणाच्या आणि महाभारतातल्या गोष्टी सांगायला लागली.

मुलांना शाळेत इंटरेस्ट निर्माण झाला. पुस्तकामध्ये त्यांना आस्था वाटू लागली. मुले आता रोजची वर्तमानपत्रे वाचू लागले. लहान लहान पुस्तके वाचू लागली.

एक दिवस सौदागर काका सातारकर आणि यशोदेची आई एकत्र असताना, सातारकर म्हणाले.

“आपल्या मुलांना सारखाच गणवेश मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे श्रीमंत गरीब असा भेद राहत नाही. सर्वांना सारखेच कपडे. या करतात जर कोणी डोनर असेल तर त्या तर तो बघून त्याचे कडून कपडे मिळवावे. ‘

यशोदेची आई म्हणाली, मी सरपंचांना शाळेच्या गणवेशाची मदत करायला सांगते, हल्ली ते माझ्याकडे शाळेबद्दल आणि शिक्षकांबद्दल नेहमी चौकशी करत असतात. आपण त्यांना पण या धडपडीमध्ये एकत्र घ्यावे.

सातारकर – ही चांगली कल्पना आहे, वाटल्यास मी सरपंचांना भेटतो, त्यांची मदत पुढील अनेक गोष्टीसाठी आपल्याला लागेल.

सातारकर दुसऱ्या दिवशी सरपंचांना भेटले. शाळेची प्रगती सरपंच ऐकून होते. स्वतः शाळेतील शिक्षक त्यांना भेटायला आल्याने त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी मुलांना गणवेश देण्याची तयारी दाखवली एवढेच नव्हे तर सर्व मुलांना चप्पल देण्याची पण तयारी दाखवली.

सातारकर ने मुलांचे कपडे गावातील शिंप्याकडूनच शोध घेतले. सरपंचांकडून त्याच्यात त्याला पैसे देऊन शहरातून कापड आणायला सांगितले, एवढे का मिळाल्याने गावचा शिंपी सुद्धा खुश झाला. आता शाळेत जाणारी सर्व मुलगी आणि मुली एका ड्रेस मध्ये दिसू लागली. गावातील पालकांच्या पण हे लक्षात आले. शाळेमध्ये चांगले बदल होत आहेत हे त्यांच्या लक्षात आले.

सातारकर ने एकदा सौदागर काकांसमोर कल्पना मांडली. सौदागर काकांनी आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी शाळेतील मुलांचे एक एक विषय शिकवावा. म्हणजे आपल्यावरील पण दबाव कमी होईल. सौदागर काकांना ही कल्पना फारच आवडली. त्यांनी सातारकरणा सांगितले ” माझ्या पत्नीला गणित शिकवायला फार आवडते, तसेच मला मराठी आणि इतिहास भूगोल शिकवायला फार आवडतो, तुम्ही जर परवानगी दिली तर आम्ही मुलांना हे विषय शिकवू ‘. सातारकर खुश झाले.

सौदागर काकू तिसरी आणि चौथीचे गणित घ्यायला लागल्या. सौदागर काका मुलांचे इतिहास भूगोल आणि मराठी शिकवायला लागले. यशोदेची आई मुलांना इंग्लिश शिकवायला लागली. बाकी सर्व विषयांवर लक्ष ठेवायला सातारकर स्वतः होतेच.

शाळेचे वातावरण बदलले, मुलांना अभ्यासात इंटरेस्ट निर्माण झाला, मुलाची भाषा सुधारली, गणित जमू लागले, इंग्रजीची लिपी पाठ झाली, लिहायला यायला लागली.

तिसरीच्या मुलांपासून सातारकरणी स्कॉलरशिप ची तयारी करून घ्यायला सुरुवात केली. दुसऱ्याच वर्षी दोन मुलांना स्कॉलरशिप मिळाली, त्यापैकी एक यशोदा होती. यशोतेच्या बाबांना आजी-आजोबांना खूप आनंद झाला. छोट्या गावात राहून सुद्धा यशोदेचा अभ्यास व्यवस्थित होत होता म्हणून ते खुश होते.

सातारकरांची इच्छा होती मुलांना सायकल चालवायला शिकवावे, पुढे आयुष्यात त्यांना वाहने चालवायला यायची असतील, तर मुला मुलींना यावेळी पासून सायकल चालवता यायला पाहिजे. पुन्हा सातारकर सरपंचांना भेटले. सरपंचांनी एका निधीतून मुलांच्या दोन सायकली आणि मुलींच्या दोन सायकली भेट दिल्या. मुलं आणि मुली सायकल शिकल्या. काही मुलांनी मग सायकल घेतली आणि सायकल वरून मुलं शाळेत यायला लागली.

हें चालू असताना सातारकर वरच्या वर्गाच्या परवानगी बद्दल धडपडत होते, मुले वाढत होती, पाचवीची परवानगी मिळाली, आजूबाजूच्या गावातील मुले पण या शाळेत यायला धडपडत होती, आता सरकारकडून एस्मिन शेख ही अजून एक शिक्षिका मिळाली, ही नवीन पिढीतील असल्याने कॉम्पुटर शिक्षण घेऊन आलेली होती, शिवाय ती चित्राकेलेच्या परीक्षा पहिल्या वर्गात पास झालेली.

सातारकर खूष झाले, शेख बाई मुलांना चित्रकला शिकवायला लागल्या, शाळेत इ्लिमेंटरी ड्रॉईंग ची तयारी सुरु झाली.

आता त्या गावातील आणि आजूबाजूच्या गावातील लोक या शाळेला ” सातारकरांची शाळा ‘ म्हणु लागले, मुलाला कुठल्या शालला घातलं? म्हंटल की ” सातारकरच्या की, आनी दुसरीकडे कशाला जायचं ‘ आस्स उत्तर यायचं.

शाळेला स्वतःची जागा असावी असे सातारकर ना वाटत होते. सौदागर काकांनी आपली जागा फुकट वापरायला दिली हा त्यांचा मोठेपणा. पण शाळेचे हळूहळू वर्ग वाढत जाणार, तसतसे अजून वर्ग लागतील, त्या दृष्टीने सातारकर यांचे प्रयत्न सुरू होते.

गावच्या सरपंचाकडे सातारकर बोलले, हा तुमच्या गाव आहे आणि तुमची शाळा आहे. तुमच्या पुढच्या पिढीला जर चांगलं शिक्षण हव असेल, तर चांगल्या शाळेसाठी मोठी जागा हवी आहे. त्या दृष्टीने आत्तापासून प्रयत्न करायला हवेत. सरपंचांनी पण अनेकांकडे शब्द टाकला. शेवटी आत्माराम पाटील धावून आले. त्यांनी आपली 20 गुंठे जमीन शाळेकर्ता देण्याचे कबूल केले. आता जमीन तर मिळाली, बांधकाम पुढे करता येईल, असे सातारकर ने मनात म्हटले.

सातारकरणा या गावात येऊन चार वर्षे पुरी झाली होती. त्यांनी बदली फक्त पाच वर्षासाठी मागितली होती. आता सातवीपर्यंत वर्ग सुरू झाले होते. साडेचारशे मुले शाळेत येत होती. सध्याच्या चार खोलीत मुले मावत नव्हती, म्हणून सौदागर काकांच्या घरी पण काही वर्ग बसत होते, शाळेला अजून दोन शिक्षक मिळाले, आता स्टाफ चार शिक्षकांचा झाला,

सौदागर काकांच्या सल्ल्याने गाव मीटिंग झाली. गावातील सर्व मंडळींनी शाळेसाठी बिल्डिंग बांधावयाचे ठरले. सुरुवातीला आठ खोल्यांची बिल्डिंग असणार होती. आणखी खोल्यांसाठी नियोजन करून ठेवण्यात आले होते. पैशासाठी सरपंच आणि इतर ग्रामस्थ जिल्ह्यात फिरले मुंबईत फिरले. मूळ या गावातील पण आता मुंबईत नगरसेवक असलेल्या एका गृहस्थाने शाळा बांधून देण्याचा शब्द दिला. एका महिन्यात भूमिपूजन झाले आणि शाळेचे बांधकाम सुरू झाले.

सातारकर कॉलेजमध्ये असताना हेमल कसा ला जाऊन आले होते. आमटेंच्या त्या शाळेत आदिवासी मुले कॉम्प्युटर आणि टॅब सहजपणे हाताळत होते. सातारकरांची इच्छा होती आपल्या वरच्या वर्गातील मुलांना असे टॅब मिळावे. जेणेकरून ही मुले ऑनलाइन शिक्षण घेऊ शकतील. आता शहरातील मुले मोठमोठ्या विद्यापीठांचे क्लासेस आपल्या टॅब वर घेतात आणि यशस्वी अभ्यास करतात. येणाऱ्या काळासाठी “e’बुक वाचणे पण महत्वाचे होणार आहें.

असे सुमारे 25 ते 30 टॅब मिळणे आवश्यक होते. मुलांसाठी असा टॅब देणारा कोणी डोनर मिळाला तर हवा होता.

त्याच दरम्यान गावात जत्रेची धामधूम सुरू होणार होती. जत्रेचे होल्डिंग्स गावात लावले गेले होते. यावर्षी गावात ” माधवी पाटील ‘ हिचा तमाशा आयोजित केला होता. माधवी पाटील हिच्या तमाशाचे अनेक व्हिडिओज व्हाट्सअप फेसबुक वर फिरत होते. या भागातील सुद्धा अनेक तरुण लांबच्या गावात जाऊन तिचे तमाशे पाहत होते. माधवी पाटील हिचा तमाशा गावात होणार म्हणून गावात मोठ्या उत्साहाचे वातावरण होते.

– क्रमशः भाग दुसरा  

© श्री प्रदीप केळुसकरदुसरा

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सातारकरची शाळा – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ सातारकरची शाळा – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

राम सातारकर दुपारी अकराच्या सुमारास एसटी मधून वडगावच्या स्टॉप वर उतरला, समोरास त्याला एक स्टेशनरी दुकान उघडे दिसले, त्याचे कडे जाऊन मराठी शाळेची त्याने चौकशी केली.

सातारकर – अहो, इथे मराठी शाळा कुठे आहे हो?

दुकानदार – असं दोन मिनिटं मागं चालत जावा, तिथं आंब्याचं झाड दिसल, तिच्या समोर दिसते ती मराठी शाळा.

सातारकर – बर बर.

सातारकर मागं चालत गेला, दोन मिनिटं चालल्यानंतर त्याला एक आंब्याचं झाड दिसलं, पण शाळा कुठे दिसेना. तिथं एका पडक्या घरामध्ये दोन-तीन म्हशी बांधलेल्या दिसत होत्या. सातारकर म्हशींच्या दिशेने पुढे निघाला, तिथे त्याला एक बोर्ड दिसला “जिल्हा परिषद मराठी शाळा, गाव वडगाव ‘. सातारकर च्या लक्षात आले, इथे जवळपास कुठेतरी शाळा आहे. म्हशींच्या बाजूने तो पुढे गेला, तेव्हा त्याला पुढे दोन खोल्या दिसल्या, त्या दोन खोल्यात बारा तेरा मुलं बसली होती, आणि खोल्यांच्या बाहेर 35 36 वर्षाचा एक माणूस उभा होता. त्या माणसाला पाहता सातारकरनं ओळखलं, हेच कुरले सर असणार.

सातारकर – नमस्कार सर, मी सातारकर.

कुरले – बरं झालं की, तुमी आलं न्हवं, तुमचीच वाट पहात व्हतो. आता शालचा चार्ज घेवा आनी मल सोडवा.

सातारकर – एवढे कंटाळला की काय सर?

कुरले – कंटाळलो? ह्या गावात दोन वर्ष ऱ्हाणं, म्हणजे अंदमान शिक्षच की वो (कुरले सात मजली हसला). आता घेवा चार्ज.

सातारकर ने शिक्षणाधिकाऱ्यांच या गावात बदली केल्याचा आदेश त्यांना दाखवला. तसं कुरले नी रजिस्टर वर नोंद केली, आणि आदेश फायलीला लावला.

कुरले – चला सातारकर, तुमास्नी शाळा दाखवतो.

कुरले उभे राहिले, तसे सातारकर पण उभे राहिले, मग या खोलीतून त्या खोलीत जात, कुरले सातारकर ना म्हणाले

कुरले – ही आता तुमची शाळा. चार वर्ग हाईत, चार वर्गात मिळून अकरा मुलं हाईत. पाच मुलगे सहा मुली. पहिली दोन मुलं, दुसरी चार मुलं, तिसरी चार मुलं आणि चौथी दोन मुलं.

सातारकर – बरं ठीक आहे, आता मला तुम्ही राहत होता ती जागा दाखवा. माझी तेथे सोय होईल का?

कुरले – व्हाईल की, तसा आत्मराम काका बरा हाय, तेचि घरवाली बी बरी हाये, दुपारी त्यांची ओळख करून देतो.

सातारकर मग मुलांची चाचपणी करू लागले. पहिलीच्या मुलांना अक्षर ओळखच नव्हती. दुसरीची मुलं पण तशीच. तिसरीतील एक मुलगी मात्र स्वच्छ वाचत होती.

सातारकर – तुझे काय नाव ग मुली?

मुलगी – यशोदा, यशोदा उमाकांत सबनीस.

सातारकर – तुझ्या घरी कोण कोण आहेत?

यशोदा – माझे वडील नोकरी निमित्त मुंबईला असतात. इथे आजी आजोबा आणि आई. आजी आजारी असते म्हणून आई इथे राहिली आहे. माझी आई ग्रामपंचायत सदस्य आहे.

सातारकर – हो का, उद्या मी तुमच्या घरी येतो, तुझ्या आजी आजोबांना आणि आईला मला भेटायचं आहे.

यशोदा – या सर, मी आईला सांगते तसं.

दुपारी कुरले सरांनी सातारकरांना खोली दाखवली. कुरले सरांनी आपल्या दोन पिशव्या उचलल्या आणि सातारकरांनी आपली एक शबनम आणि एक पिशवी तिथे ठेवली. मग दोघे आत्माराम पाटलांना भेटायला गेले.

कुरले – पाटील, आमी चाल्लो, माझी बदली झालीय आमच्या गावी, ह्ये नवीन शिक्षक आलेत बघा, सातारकर.

सातारकरांनी पाटलांना नमस्कार केला, तोपर्यंत पाटलांच्या घरवालीने पाणी आणि गूळ आणून ठेवला होता.

सातारकर – कुरले सरांची तुम्ही जशी जेवणाची व्यवस्था केली, तशीबाची व्यवस्था होईल का तुमच्याकडे?

पाटील – व्हाईल की, आमी दोगच असतो इथं, एक पोरगी लगीन करून गेली, आमच्या घासत तुमचा एक घास. काळजी करू नका.

सातारकर – मला जेवण करायला येतं, पण जेवणात अडकलं की मुलांकडे व्यवस्थित पाहता येत नाही. माझं अजून लग्न झालं नाही, आणि घरून कोण माझ्याबरोबर येऊ शकत नाही.

पाटील – काय बी चिंता करू नका, आमी सकाळ सायंकाळी चा पण देऊ तुमाला.

सातारकरांना खोली दाखवून आणि आत्माराम पाटलांकडे जेवणाचे फिक्स करून दुपारच्या गाडीने कुरले आपल्या गावी गेले

दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यावर सातारकर यशोदे बरोबर तिच्या घरी गेले. यशोदेने कालच आपले सर उद्या भेटायला येणार आहेत हे सांगितल्यामुळे यशोदेची आई त्यांची वाटच पाहत होती.

यशोदेची आई –या सातारकर सर, कालच इकडे बदलून आलात का?

सातारकर – होय मॅडम, काल आल्या आल्या मी शाळेतील मुलांची चाचपणी घेतली, तेव्हा माझ्या लक्षात आलं, इयत्ता तिसरी मधील यशोदा हीच एक मुलगी तिसरी च्या अपेक्षे एवढा अभ्यास करते आहें, म्हणून मी यशोदेला तिच्या घरच्या माणसांबद्दल विचारलं, तेव्हा ती म्हणाली तिचे बाबा मुंबईत राहतात, आणि तिची आई आणि आजी आजोबा इकडे राहतात. म्हणून माझ्या लक्षात आलं, यशोदेची आई तिच्या अभ्यासावर लक्ष ठेवून असणार, म्हणून मुद्दाम मी भेटायला आलो.

यशोदेची आई – हो खरंय, माझं माहेर रत्नागिरीचं, घरातील सर्व सुशिक्षित, माझ्या सासूबाई गेली दोन वर्षे बिछान्यावर आहेत, त्यांची शहरात यायची इच्छा नाही, आमची मुंबईतील जागा पण तेवढी मोठी नाही, त्यामुळे मी यशोदेसह इथे राहायचे ठरवले, इथल्या शाळेतील मुलांचा अभ्यास व्यवस्थित नाही, या आधीचे शिक्षक पण इंटरेस्ट घेऊन शिकवत नाहीत, त्यामुळे मीच माझ्या मुलीचा अभ्यास घेते.

सातारकर – वहिनी हे तुम्ही चांगलेच करतात, पण शाळेतील सर्व मुलांनी चांगला अभ्यास करावा असे माझे मत आहे, मी या गावात चार ते पाच वर्ष असेन, तोपर्यंत मुलांच्या अभ्यासात चांगला बदल व्हावा अशी माझी इच्छा आहे. या गावातील जे सुशिक्षित मंडळी आहे, ज्यांना शाळेबद्दल आणि मुलांबद्दल आस्था आहे, त्या सर्वांनी एकत्र येऊन हे काम करायला हवे. याकरता मला तुमचे सहकार्य लागेलच, पण अजून ज्यांना शाळेबद्दल आणि मुलांबद्दल आस्था आहे अशी मला माणसे हवी आहेत.

यशोदेची आई – सर, या गावात सौदागर नावाचे गृहस्थ आहेत, सचिवालयातून निवृत्त होऊन ते आणि त्यांची पत्नी इथे राहतात, त्यांना पुस्तकांची आणि वाचनाची खूप आवड आहे, मुलांसाठी काहीतरी करावे यासाठी त्यांची धडपड असते, पण या आधीचे शिक्षक त्यांना सहकार्य करत नव्हते. आपण त्यांना भेटू.

सातारकर – हो वाहिनी, मी उद्या सकाळी नऊ वाजता सौदागर काकांच्या घरी जातो आणि त्यांना भेटतो.

यशोदेची आई – उद्या मी पण काकांकडे सकाळी नऊच्या दरम्यान जाणार आहे, मी त्यांच्याकडून पुस्तके वाचायला आणत असते, मी आणलेली पुस्तके वाचून झाली आहेत, ती देऊन दुसरी पुस्तके घ्यायची आहेत, तेव्हा तुम्ही उद्या नऊ वाजता येणार असाल तर मी तिथे आहे.

सातारकर – हो वहिनी, फार बरे होईल, उद्या सकाळी नऊ वाजता मी तिथे येतो.

दुसऱ्या दिवशी सातारकर सौदागर काकांच्या घरी पोहोचले, तेव्हा काका आपल्या लायब्ररीत बसले होते, काकांच्या अवतीभवती पुस्तके पुस्तके होते, ताजी वर्तमानपत्रे होती. अनेक अंक होते. यशोदेची आई तिथे उभी राहून पुस्तके चाळत होती.

सातारकर तिथे जाताच, यशोदेच्या आईने त्यांची सौदागर काकांबरोबर ओळख करून दिली.

सौदागर काका – मला काल बातमी कळली, शाळेमध्ये कोणीतरी नवीन शिक्षक आले आहेत म्हणून. मागील शिक्षक मला कधी भेटून आल्याचे आठवत नाही. पण तुम्ही मला भेटायला आलात, खूप आनंद झाला.

सातारकर – होय काका, मी पाच वर्ष तरी या शाळेत आणि गावात असेन. मुलांच्या शिक्षणासाठी इथे काही बदल करावे लागतील. तुमची दोघांची मला मदत हवी. सबनीस वहिनी ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांचा पण आपण उपयोग करून घेऊ. पहिली गोष्ट म्हणजे शाळेची इमारत, सध्याची मुलांची शाळा म्हशीच्या गोठ्यात आहे, आपल्याला ही जागा बदलावी लागेल, जर कुठे चार खोल्यांची पण स्वतंत्र अशी जागा देत असेल, तर शिक्षणाधिकाऱ्यांना मी सांगून ती जागा आपण भाड्याने घेऊ शकतो.

सौदागर काका – अहो भाड्याने कशाला, माझीच मागच्या बाजूला एक लहान बिल्डिंग आहे, त्यात खाली दोन खोल्या आणि वर दोन खोल्या आहेत, शाळेची स्वतःची जागा होत नाही तोपर्यंत माझी ही जागा मी शाळेसाठी फुकट देतो.

सातारकर – हे तर छानच झाले, मी तसे शिक्षणाधिकाऱ्यांना कळवतो.

सातारकरनी शिक्षणाधिकाऱ्यांना नवीन जागेबद्दल कळवले. सौदागर काकांनी शाळेची नवीन इमारत होईपर्यंत आपली जागा फुकट वापरायची परवानगी दिली. एका महिन्यात शाळा सौदागर काकांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या बिल्डिंगमध्ये आली.

– क्रमशः भाग पहिला  

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दंगल… — भाग – ३ – लेखक – श्री रवी दलाल ☆ प्रस्तुती – सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ दंगल… — भाग – ३ – लेखक – श्री रवी दलाल ☆ प्रस्तुती – सुश्री प्रणिता खंडकर ☆

(एक अखेरचा डाव) 

(महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक, कथाकार श्री रवी दलाल यांची नुकतीच दिल्लीतील रॉक्स पुरस्काराकरीता निवड झाली. मराठी साहित्यकाराने दिल्लीतील दंगल जिंकून बहुमोलाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. राॅक्स हा विविध आठ भाषेतून आंतरराष्ट्रीय दर्जाचा विशेषांक निघतो… या पुरस्कारासाठी त्यांच्या “आंगधुणी” या कथासंग्रहातील “दंगल“ या पुढील कथेची निवड झाली आहे.) 

(आशाला नव्याने संसार करू द्या म्हणून आशाच्या मायने संताजीला समजावलं. संताजी तयार झाला पण एक अट घातली) – इथून पुढे —-

दुसऱ्या दिवशी लखन आणि प्रताप मारोतीच्या घरी आले. आबासाहेबांनी होकार पाठवला पण आबासाहेबांची एक अट आहे. मारोती गुजर बोलता झाला. कोणती अट घातली ? आबासाहेबांनी, आमचं पाटील कुटुंब म्हणजे खानदानी, आज्या – पंज्या पासून कुस्तीची वैभवशाली परंपरा जोपासणार कुटुंब आहे. आमच्या कुटुंबात आजपर्यंत पहेलवानचीच पोरगी मागण्याचा रिवाज आहे. ” माझ्या आज्या – पंज्यापासून ते आम्हा भावापर्यंत आम्ही पहेलवानाच्याच पोरी घरात करून आणल्या आणि आशाला पण बिहाडीला पहेलवानाशीच लग्न गाठ बांधली होती. पोरगी द्यायची तर मर्द माणसाच्या घरात आणि पोरगी करून आणायची तर मर्द माणसाची असा आमचा खानदानी रिवाज आहे. ” तुम्ही आबासाहेबांचे समकालीन वस्ताद पण बळवंताने कधीच मैदान मारले नाही, कधी कुस्ती खेळला नाही. आबासाहेबांचा आदेश आहे. आशा सोबत लगीन करायचं असेल तर मैदानात दोन हात करून जिंकावे लागेल. तेव्हा आशा सोबत लगीन करण्याचा मार्ग मोकळा होईल. आबासाहेबांची ही अट मंजूर असेल तर बोला आणि पानविडा समोर ठेवला. जर कुस्तीची अट मंजूर असेल तर विडा उचला नाहीतर आम्ही निघतो…..

मारोती बळवंताचे चेहरे पडले कारण बळवंता कधीच मैदानात कुस्ती खेळला नव्हता. संताजी पाटलाने अजब अट घालून पेचात पाडले होते. ” कुस्ती जिंकूनच आशा मिळवता येईल अन्यथा संबंध होणार नाही….. मारोती चुपचाप होता कारण पोरगा बळवंताला मैदानी कुस्तीची सवय नव्हती. समजा कुस्तीस होकार दिला तर भर मैदानात आत्महत्या करण्यासारखं होईल. जिंकू किंवा मरू या भावनेने बळवंताने विडा उचलला आणि कुस्ती लढण्यास होकार भरला. शाल – दुपट्टा देऊन संबंध पक्का झाला. “

पंचमीला यात्रा नुकतीच झाल्याने पुढच्या वर्षी पंचमीला लढत होणार. प्रतापने शाल – श्रीफळ देऊन सांगितले. बळवंत तुला एक वर्ष वेळ असून मेहनत घे, कसरत कर अन बापाकडून डावपेच शिकून तरबेज हो !आणि खुल्या मैदानात लखन ला आसमान दाखव. आता नंतरची भेट मैदानात होईल. प्रताप – लखन शाल – दुपट्टा घेऊन रवाना झाले आणि बळवंताने आखाडा पिसायला सुरुवात केली.

बलाढ्य मारोती आता जरी थकला असला तरी चेले त्याने तयार केले होते. मारोती नवीन डावपेचाचा जनक होता, बापाचा हात डोक्यावर असल्याने बळवंताची हिम्मत दुगुनी झाली होती. बळवंताने बापाच्या नजरेत खाली कसरत सुरू केली. आखाड्यातील तरबेज पहेलवानासोबत दंड – बैठका जोर अजमावणे सुरू झालं. पन्नास किलोमीटरवरची दौड सुरू आणि काजू -पिस्ता -बदाम – दूध – तुपाचा अलप सुरू केला. सूर्यनमस्कार दंड – बैठका, दोर -कसरत, पन्नास किलो वजन घेऊन पहाड चढणे सुरू केले. रात्रंदिवस व्यायाम करून शरीर आणखी भरदार होऊ लागलं. अधिक ताकदीच्या पैलवानासोबत खेळून जोर वाढवत होता. आखाड्यातील अनेक तगड्या पहेलवानीशी झुंज सुरू केली. पहेलवानकी हे बळवंताच्या रक्तात होती. फक्त त्याचा उपयोग केला नव्हता आणि फक्त पाच महिन्यातच बळवंता कुस्तीत तरबेज झाला.

पोराचा संसार थाटण्यासाठी मारोतीने वयाच्या 65 व्या वर्षी पुन्हा लंगोट कचली आणि मैदानात उतरला. बापासोबत पोराची तालीम सुरू झाली. आजपर्यंत कुणालाही न दिलेले डावपेच मारोतीने बळवंतावर आजमावले. अख्खा – डाव, बांगडी – डाव, धोबी – डाव, मानतोडी, उलटा – डाव, घिसा – डाव, मानगुटी – डाव, फसली – डाव बळवंताला शिकविले आणि प्रत्येक गावाची पद्धत समोरच्या पहेलवानाचा डाव ओळखण्याची कला मारोतीने शिकविली. एका वर्षात बळवंताने लेवल गाठली. बापाकडून शिकून चपळ आणि तरबेज झाला.

एका वर्षातच बळवंता सात पहेलवानाशी झुंजला. ” भंडाऱ्याचा हिम्मत पहेवानाला चित केले तर देवळीत जाऊन नबू शेख वस्तादाला आसमान दाखवले. मोठ्या पहेलवानाशी लढत देऊन हिंमत आणि ताकत दुप्पट केली. रामटेक थूगावच्या दंगलीत पंजाबी शेरा पहेलवान उतरला आणि लढत झाली पण बळवंता हरला. ज्या डावावर बळवंता पडला त्या अकली डावावर मारोतीने घिस्सा डाव शिकविला आणि पुन्हा पंजाबी शेरा सोबत लढत केली. दुसऱ्या कुस्तीत पंजाबी शेराला अवघ्या पाच मिनिटात भुईसपाट केलं.

यात्रेच्या आधीच बळवंता सात कुस्ती खेळला आणि जिंकला. इकडे लखन कुस्तीत आधीच नावाजलेला होता. त्याला मेहनत घेण्याची गरज नव्हती. पण संताजीच्या देखरेखित लखनची पिंढन चालू होती तर इकडे मारोती लंगोट कचून बळवंताला डावपेचात तरबेज करत होता. वीस वर्षापासून दंड – बैठका मारून लखनच शरीर दगडासारखं टणक होतं. लखनच्या वीस वर्षाच्या मेहनती पुढे बल्लूची एक वर्षाची मेहनत टिकणार नव्हती. लखनने बल्लूला हलक्यात घेतले आणि गाफील राहिला. पण मारोतीने कानमंत्र दिला. शक्तीवर युक्तीने विजय मिळवण्याची कला शिकविली.

आशाने बळवंताला कुस्तीत जिंकण्याचा वचन मागू नये म्हणून लखनने बहिणीकडून राखी बांधली नाही आणि दंगलीचा दिवस उजाडला. वर्षभराची प्रतीक्षा संपली. कुस्तीसाठी जनसागर उलटला होता पण यावेळी लोकांची भावना बळवंता सोबत जुळली होती. ” लखन हारावा व अशा चा संसार बसावा म्हणून अनेकांनी देवापुढे साकडे घातले होते. लखनला पराभूत करून आशाला मिळवायची होती तर लखनला बापाची पगडी शाबूत ठेवून ही कुस्ती जिंकायची होती.

कुस्तीला जातेवेळी आई पत्नी औक्षवंत करायचे पण यावेळी कुणीच ओवाळले नाही. लखन हरावा सर्वांच्याच मनात होतं. मैदान भरले पण यावेळी जोश नव्हता. भयानक शांतता पसरली होती. बळवंताची कुस्ती आशाला नवजीवन देण्यासाठी होती तर सख्खा भाऊ बहिणीला जीवनभर विधवा ठेवण्याच्या तयारीत होता.

लखन बळवंत मैदानात आमने- सामने आले. दोन माजी दिग्गज पहेलवान संताजी – मारोती पेंडॉलमध्ये विराजमान होते. लखन साठी ही लढत बहिणीला विधवा ठेवून घराणेशाहीच्या पारंपारिक सन्मानासाठी होती तर बळवंताची लढाई विधवेला नवजीवन देण्यासाठी होती. बळवंताने बापाचे पाय धरले. मारोतीने शांत राहण्यास सांगितले, घाई करू नको, तू आक्रमण करायचं नाही, आधी बचाव कर, लोकांची ताकद मोठी आहे आणि नंतर बळवंताने संताजीचे पाय धरले. ” संताजीने विजयी भव ” असा आशीर्वाद दिला. मग लखन बापाचा आशीर्वाद घ्यायला गेला ” पण बापाने पाय मागे घेतले.

आता संताजी जनभावना समजून चुकला होता. सर्व गर्दी बळवंताकडून होती. त्याला विधवेला न्याय द्यायचा होता तर लखनला बुरसटली परंपरा जोपासायची होती.

नामदेव सुताराने पहेलवानाचा परिचय करून दिला. कुस्ती सुरू झाली. ताकद आजमावने सुरू झाले. लखनच्या प्रचंड ताकतीपुढे बळवंत टिकाव धरत नव्हता. लखनच्या आडदांड शरीरापुढे बळवंताची ताकत कमी पडत होती. ही लढाई हळूहळू रंगात आली. लखनने वाकून बळवंताला घिस्सा डावात घेतले आणि बळवंताने दोन्ही पायाच्या फटीत लखनचा हात दाबला. पायाची कैची मजबूत केली तशी लखनने मानगुटी सोडली. पायाची आडी देऊन बळवंताला उघडा केला आणि मनगटाचा जबर वार मान्यवर केला. वार चुकवून बल्लू सुटून उभा झाला. लाल माती उडाली आणी जाध ठोकून बल्लू पुन्हा तयार झाला. मारोतीने सांगितलं होतं, लखन ताकदीने हरणे नाही युक्तीने हरवावे लागते. डावा मागून डाव सुरू झाले. लखनला वाटले, नोकरी करणाऱ्या नाजूक फुलाला मिनिटात कुचलून टाकू पण बळवंताला उमदा भरत होता. बळवंताला पाच मिनिटात चित करू हा भ्रम तुटला. लखनला आक्रमण करून बल्लूवर ताबा मिळवण्यासाठी खेळत होता. पण बल्लूने डाव फेल करून वेळ मारून नेली. कुस्तीचा रुख बदलला. आता लखन बल्लूच्या डावातून बचावात्मक पवित्रा घेत होता.

लखनने चढाई थांबवली. बल्लूचा प्रत्येक डाव लखनची धडकी भरवत होता. लखन कडून सर्व डाव खेळून झाले पण बल्लू चित होत नव्हता. ढोबी पझाड, घिस्सा – डाव, पटी – डाव, आतली टांग – बाहेरची टांग, बांगडी डाव मरून झाले. बल्लू मातीने न्हावून निघाला पण चित होत नव्हता. दात ओठ खाऊन लखन पुन्हा भिडला. लखन ताकदीच्या जोरावर लढत होता. बल्लू डावावर डाव मारत डाव परतवत होता. कुस्तीला अर्धा घंटा होऊन गेला पण कुणी कुणाला हात देत नव्हता. संताजीने ओरडून लखनला मोडी डाव मारण्यास सांगितले. योग्य टाइमिंग वेळ साधून गुघडी पोझिशन पाहून शांत बसलेला मारोती एकदम जोशात आला. त्याने लखनच्या डोळ्यातली भीती हेरली होती. शारीरिक थकवा दिसला. हीच योग्य वेळ साधून मारोती ओरडला ” बल्लू, ” मुडी डाव घाल पझाडू ” बापाचा आवाज ऐकून बल्लू पवित्रात आला. लखनला ” मुडी डाव ” माहीत असल्याने लखनने पायाची मोड केली. लखन गाफील झाला आणि बल्लूने मुडी डावाचा पवित्र घेऊन, मानेत हात घालून पायाने ” करठी डाव ” टाकला आणि लखन चीत झाला. नवख्या बल्लूने अखेरचा डाव साधला आणि लखलला आसमान दाखवले.

मैदानात हाहाँकार मचला पंचाने निर्णय दिला, बल्लूला विजय घोषित केले. बल्लूने लखनच्या शक्तीला न जुमानता युक्तीने विजय मिळविला होता. वीस वर्षाचा अनुभवी पहेलवाना समोर एक वर्षाची मेहनत जिंकली होती. मारोतीच्या युक्तीने बल्लूला जिंकविले होते. हा आनंद गावात साजरा करण्यात आला. प्रचंड ताकदीचा लखन घरच्याच मैदानात नवख्या पहेलवानाकडूनच चित झाला. मारोतीचा चेहरा आनंदला – फुलला……

बल्लूने लखनला हरवल्याची बातमी आशाला कळली. आईला कवटाळून आशाने मुका घेतला आणि आनंदाने घिरटी घेतली. बल्लू जिंकला ठरल्याप्रमाणे आशाच लग्न बल्लू सोबत होणार होतं…. विधवा आशा पुन्हा सौभाग्यवती होणार होती. आशाचा संसारवेल बळवंता सोबत फुलला आणि ठरल्याप्रमाणे संताजीने आशाचे लग्न बल्लू सोबत लावून दिले. ” कुस्तीच्या मैदानातील कट्टर हाडवैरी आता व्याही झाले होते. “

– समाप्त – 

लेखक : श्री रवी दलाल

 9960627818

प्रस्तुती –  सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares