मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अजून मला मागणी आहे… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

??

☆ अजून मला मागणी आहे…  ☆ श्री सुहास सोहोनी

अजून मला मागणी आहे – – –

तेव्हा वेळ पुरत नसे आता जाता जात नाही.. तेव्हा कामं संपत नव्हती.. आता हाती कामच नाही —

या खोलीतून त्या खोलीत बिनकामाच्या येरझार्‍या.. गादीवर झोपू का खुर्चीत बसू.. कां व्हरांड्यात मारू फेऱ्या….

खायला काळ झालोय् का.. भुईला भार होतोय् का.. जगायला कारण उरलं का नाही.. काय करावं ते कळतंच नाही —

😣

वर्‍हाडकल्डा मित्तर बोलला.. नाय् ता इच्च्यार नको रे बाप्पा.. नन्नाचा पाढा काहून गायला.. देव तुजेवर व्हईल नं खप्पा —

तुये अशे रे उफराट बोलने माया त बिल्कुल नायच पटले.. तुयासारक्या टग्या बाप्यांनी होयाचे नाय् कदी केराचे टोपले —

👍

मालवणी दोस्त ऐकुन धावला.. मिठी मारून प्रेमानं बोलला.. वसाड्या तुजा म्हनना तरी काय.. शाळ्याचो पानी पी, ग्वाड किती हाय… ! 

नारल सोलुक झापा इणुक येळ माका पुरूचा नाय.. घरात बसून आंबट तोंडान् डोक्याचा खोबरा करूचा नाय्…

👍

तेवढ्यात आमची ही कण्हत आली.. कमरेत तिच्या उसण भरली.. झंडू बाम देत म्हणाली.. ” थोडसं चोळून द्याल का ?” तेवढ्यात मुलगा घाईत आला.. हातात कागद ठेवित म्हणाला “दहा कॉपीज् प्रिंटर वरून पटकन् काढून द्याल कां?”

– – तेवढ्यात सुनबाई ओटीवर आली. पिठाचा डबा आदळत म्हणाली ” झांकण फिट्ट बसलंय् घट्ट

प्लीज् उघडून द्याल कां?”

– – तेवढ्यात नातू आला रडत, ” चित्र काढायला मला नाही जमत, सूर्य, डोंगर, नि उडते पक्षी, काढून द्या ना छोटिशी नक्षी. “

– – – आणि अचानक डोक्यात लखकन् वीज चमकली.. माझं मला उमगलं आहे.. लहान मोठ्या कामांसाठी अजून मला मागणी आहे !!

…. अजून मला मागणी आहे !!

सगळंच काही संपलं नाहीये कळून आता चुकलं आहे.. आपली कामं नसली तरीही दुसऱ्यांना मदत करायची आहे !

नकारी विचार करायचा नाय्.. सकारी विचार सोडायचा नाय.. केराचं टोपलं होयाचं नसतं.. शाळ्याचं पानी गोडंच असतं

आयुष्य शहाळ्यासारखं असतं.. त्याचं मळकं टोपलं करायचं नसतं.

आणि — 

– – – आणि आपणच आपली किंमत राखली तर जग आपल्या मागे धावतं !!

🍁 🍁

© श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ फिरुनी नवी जन्मेन मी… – लेखिका : सुश्री मृणाल धोंगडे ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

सौ. बिल्वा शुभम् अकोलकर

? मनमंजुषेतून ?

☆ फिरुनी नवी जन्मेन मी… – लेखिका : सुश्री मृणाल धोंगडे ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

फिरुनी नवी जन्मेन मी…

आपण साधं कोपऱ्यावर जायचं तर घरी सांगून, कधी परत येणार त्याप्रमाणे किल्ल्या, कामाच्या बायका सगळ्या सोयी लावून निघतो… परगावी जाणार असलो आणि घरच्यांचा स्वैपाक येण्याचा उजेड असेल तर दोन दिवस असतील तर दोन भाज्या extra करून, श्रीखंड आणून ठेवून जातो.. जरा जास्त दिवस जाणार असू तर चिवडे लाडू चकल्या असे डबे भरून, स्वयंपाकाच्या बाई नसतील तर रोजच्या जेवणाचा सरळ डबा लावून, मुलांना १७६० गुणिले काही सहस्र सूचना देऊन, कामवाल्या बायकांना दांड्या मारू नका म्हणून धमकावून मग आपण जिथे जाणार असू त्याप्रमाणे आपल्या bag मध्ये अनंत गोष्टी भरून, शेजारी पाजारी, मैत्रिणी, घरातले छोटे, मोठे सगळ्यांचा निरोप घेऊन एकदाच्या बाहेर पडतो… परत येणार असू त्या तारखेनंतरचेही अनंत कार्यक्रम ठरवूनच आपण एकदाचे बाहेर पडतो…

ही अशीच बाहेर पडली असेल का? जरा तिथली देखरेख आणि थोडं पुढचं संशोधन करते आणि येतेच असं म्हणून ?? घरी दारी काय काय व्यवस्था लावून गेली असेल? तिला निघताना जाणवलं असेल का ती कधी परत येणार हे तिच्या हातात नाही ? तिची तयारी वेगळी, तिची प्रवासाची गाडी नव्हे तर यान, तिचं जाणं लग्न, मुंज, ट्रीप किंवा सेमिनार conference ला नव्हे… तिचं जाणं.. थेट अंतराळात… येणं… सगळं नीट असेल तर नियोजनानुसार.. नाहीतर… काहीच माहीत नाही…

काय असेल तिची मानसिक अवस्था… धडाडी आणि बुद्धिमत्ता आहेच हो तिच्याकडे पण स्त्रीच ना ती.. हुरहुर, भीती, भविष्याच्या अनिश्चिततेचे सावट, वाढणारे वय, तिथे अडकल्यावर झालेली घालमेल… काय काय सुरू असेल तिच्या मनात…

पण अशी अंतरिक्षात झेंडे लावणारी सुनिता आज सुखरूप परत आली.. तिनं धाडसाने ठेवलेलं प्रस्थान शास्त्र, तंत्रज्ञान आणि परमेश्वराची इच्छा यांच्यामुळे सुफळ संपूर्ण झाले..

कधीही न पाहिलेली ती सुनीता… पण ती परत आल्याचा आनंद आज प्रत्येकाला आहे.. ९ महिन्याने परत आली… जणु नवा जन्म घेऊन… तुझे पृथ्वीवर खूप खूप स्वागत सुनिता!!!

एकाच या जन्मी जणु फिरुनी नवी जन्मेन मी… या गाण्याचा आज वेगळाच अर्थ समजला मला..

लेखिका : सुश्री मृणाल धोंगडे

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सहज सुचलं म्हणून… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

??

☆ ✍️ सहज सुचलं म्हणून… ☆ सुश्री अपर्णा परांजपे

विश्वास व श्रध्दा यांचा संबंध बुद्धी व हृदय दोघांशीही आहे. बुद्धीला जे पटतं ते व तसंच घडलं की आनंद मिळतो कारण तीच आपली तळमळ असते. मन म्हणतं पहा हे असंच व्हायला हवं होतं पण एक महत्त्वाचा विषय यात दुर्लक्षित रहातो तो म्हणजे हृदयाचा कल ! हृदय या आनंदात आनंदी आहे की नाही हा विचार व्हायलाच हवा. ही गरज आहे पण त्या आवाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही असं बुध्दी मनाला पटवत रहाते. आंतरिक तळमळ व बौद्धिक इच्छा वेगळ्या आहेत हे निश्चित ! अन्यथा जे जे मनासारखे झाले आहे त्यातून संपूर्ण समाधान मिळालेच असते व हुरहूर संपली असती. पण तसे का होत नाही याचा विचार विवेकाने करणे क्रमप्राप्त आहे.

याउलट फक्त हृदयाचा कौल घेतला तर लक्षात येतं की त्याला काहीच नको आहे. त्याला देण्यात सुख आहे. त्याचा स्वभावच प्रेम, भक्ती, समर्पण आहे. व आहे त्यातही तो समाधानी आहे पण मन स्वस्थ बसू देत नाही. वेगवेगळे विकार, तुलना, इर्षा, मीच का? हे शक्य नाही असेच ठसवत जाते व हृदयाकडे दुर्लक्ष होते. ही मानवी अवस्था संत, सज्जन ओळखतात व सत्याचा एक गुरुमंत्र देतात. पण बुद्धी तो ही आपल्या आनंदाच्या कल्पनांवर घासून पहातं व ती वचने खरी नाहीत असं मनाला पटवतं.

हाच भ्रमाचा खेळ सुरू असतो. तो आपण स्वतः स्वतः च्या बुध्दीला पटवणे व तिला हृदयाकडे वळवणे हा स्वधर्म आहे.

हृदयस्थ परमात्मा मग खूष होऊन “सदा सुखी भव” चा आशीर्वाद देतो जो स्वतःचा स्वतः ला जाणवतो.

हेच तर हवंय !!

*

भगवंत हृदयस्थ आहे 🙏

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डोंगल ते वाय फाय (बालपण)… भाग – ६ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी  ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? मनमंजुषेतून ?

डोंगल ते वाय फाय (बालपण) भाग – ६ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

काळ बदलत गेला. समीकरण बदलत गेली. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. जेथे साधं पोस्ट कार्ड मिळायला दोन चार दिवसाचा, कदाचित आठ दिवस लागायचे, तिथे बातमी कळायला काही मिनिट पण लागतं नाही. रेडिओ गेला, ट्रानझीस्टर पण गेला. टेप रेकॉर्डिंग गेल. ग्रामो फोन गेला. आणि प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन आला, जग झटक्यात बदललं. त्याच रुपड बदललं.

इंटरनेट पण मोबाईलच्या कुशीत लोळू लागला. क्षणात हिकडची बातमी तिकडं. पोस्टाची काम कमी झाली. पोस्टकार्ड, अंतर्देशीय गेल.

एका मोबाईल मध्ये घड्याळ, कॅमेरा, internet, फोटो अल्बम, इन्स्टा ग्राम, फेसबुक अश्या नानाविध गोष्टीच घबाड हाती लागलं.

गेम्स नावाचा प्राणी तिथेच शिरला आणि बालपण माती मोल झालं. व्हाट्सअपनं तर जगण मुश्किल केल. माणुसकी गहाण पडली. व्हाट्सअप, फेसबुक ची व्यसन जडली. जी दारू पेक्षा घातक ठरली.

माणसातील संवाद आता स्क्रीन वर आला. एवढंच काय टीव्ही पण मोबाइलला अडकला. विसंवाद चालू झाला. घरात कोण आला कोण गेला हे पण कळल नाही. सदा भासमान दुनिया झाली. फायदे झाले तितकेच तोटे पण झाले. सतत खाली मान घालून माणुसकी टच स्क्रीन खेळायला लागला.

वाय फाय, डोंगल हे परवलीचे शब्द झाले. लहान मुलांच्या हातात मोबाईल आला आणि बालपण हरवलं गेल. वयाच्या दोन चार वर्षाच्या मुलांच्या हातात गेम्स चालू झाले. त्याशिवाय पालकांची कामे खोळाम्बत होती. खेळतोय खेळू दे. गप्प तरी बसेल. त्याच्या व्यसनाने बाळ जेवण करेल, खाईल पीईल. ह्या कारणाने ते बालक ज्यास्त अधीन होतं गेले. पालकांना कळत होतं पण वळत नव्हतं. बाहेर बांगडण्याचे खेळायचे दिवस हरवले. आणि बालपण संपुष्टात आल! चार चौघात बोलायचे हसायचे दिवस सरले. बाळ ऐकलं कोंड होतं गेल ते कळल नाही. घरी पाहुणे मंडळी आली गेली त्याच्या खिजगणतीत नव्हते. त्यात शिशुना पाळणा घर हे नवीनच तंत्र ज्ञान निर्माण केलं गेल!

ते तिथे काय करतय काय नाही हे देव जाणे! बाळ मोठं झाले घरी राहिले तर त्याला ब्लु व्हेल सारख्या गेम्सच व्यसन! बाहेरची शुद्ध हवा, शरीराला होणारा व्यायाम, ओळखी, मौज मजा ह्याला हरवून बसलाय. हेच काय ते संशोधन, हीच का ती मानवाची प्रगती! नुसते बालपणच नाही तर माणुसकी, आत्मीयता हरवलेली ही पिढी पुढे जाऊन काय काय करेल, ह्याची कल्पना सुद्धा करावी असे वाटतं नाही. सदा मान वाकडी मंडळी डोळ्याला चस्मा, येणारे पाठीला कुबड, कम्बर दुःखी इत्यादी गोष्टींची सांगड घालत देश प्रगती पथावर जात आहे. आधुनिक तंत्र ज्ञान काळाची गरज आहे, हे जरी खरे असले तरी, येणारी पिढी ही रोगग्रस्त असेल एवढ नक्कीच! त्वरित मिळत असलेल्या गोष्टीची किम्मत मात्र कमी होतं आहे का युज अँड थ्रो च्या जमान्यात माणुसकी पण गहाण पडत आहे, हे तितकेच खरे.

— समाप्त —  

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “टमाटे कसे आहेत?…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

 

🔆 मनमंजुषेतून 🔆

☆ “टमाटे कसे आहेत?…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

भाजीच्या दुकानात आपण नेहमीच जात असतो. कधी एकटे जातो, कधी बरोबर बायको असते किंवा नवरा असतो. पण बऱ्याच वेळेला आपण आपल्याच तंद्री मध्ये असतो. त्यामुळे आसपास घडणाऱ्या मजेशीर घटनांना आपण मुकत असतो. आपण नेहमीच वर्तमान काळात राहू शकलो, आणि आसपास घडणाऱ्या घटनांशी समरस होऊ शकलो, तर भरपूर आनंद मिळू शकतो, हे नक्की. हा लेख आणि ही घटना यावरच आहे.

—–

आज सकाळी फिरून येतांना नेहेमीप्रमाणे साने डेअरी मध्ये दूध घेतले. मुलीकडे सकाळी जातांना भाजी न्यायाची होती, म्हणून बायको बाजूच्याच भाजीच्या दुकानात भाजी घ्यायला गेली. दुकानदार तरुण मुलगाच होता. मी तिथेच उभा होतो.. तेवढ्यात एक मॅडम दुकानात आल्या —

मॅडम : अरे, टमाटे कसे आहेत ? 

दुकानदार मुलगा : मॅडम, टमाटे एकदम मस्त आहेत. आज न्याल तर पुन्हा नक्की परत याल.

मॅडम : अरे कसे म्हणजे तसे कसे नाही. कसे आहेत ?

मुलगा : मॅडम लाल आहेत आणि हिरवे पण आहेत. घरी गेल्यावर लगीच सार किंवा कोशिंबीर करायची असेल, तर पूर्ण पिकलेले लाल घेऊन जा. भाजी करायची असेल तर हिरवे टमाटे न्या. थोडे कमी पिकलेले पण आहेत. एकदम लहान आहेत आणि मोठे पण आहेत. कुठले देऊ?

मॅडम : अरे कसे आहेत, म्हणजे कसे दिले ? 

मुलगा : मॅडम, अजून दिले कुठे ! आताच तर दुकान उघडले आहे. आताच एका मॅडम ना भेंडी दिली, एकांना पालक दिला. टमाटो ची बोहोनी तूम्हीच करा. किती देऊ?

मॅडम : अरे, पण देणार कसे, ते सांग ना.

मुलगा : मॅडम वजन करूनच देणार. तुमच्याकडे पिशवी असेल तर त्यात देईन. नाहीतर आमची कापडी पिशवी घेऊन जा आणि उद्या पुनः भाजी न्यायला याल, तेव्हा पिशवी घेऊन या. पिशवी ८ रु ची आहे, पण मी फक्त ५ रु डिपॉझिट घेतो. आता प्लॅस्टिक कॅरी बॅग ठेवत नाही, कारण त्यावर बंदी आहे. आम्हाला थोडा त्रास होतो, पण बंदी योग्यचं आहे. कुठल्याही धोरणाला विरोध करायचा, म्हणून विरोध करणे, हे काही बरोबर वाटत नाही. आपण सगळ्यांनी बंदी चे पालन केले, तर शेवटी फायदा आपलाच आहे. बोला किती देऊ टमाटे ?

मॅडम : अरे भाव सांगशील का नाही ! भाव केल्याशिवाय कसे घेणार !

मुलगा : मॅडम, इथे भाव होत नाही. एकदम फिक्स्ड रेट, असे म्हणून त्यांनी बाजूच्या मोठ्या बोर्ड कडे बोट दाखवले.

बोर्ड वर लिहिले होते “इथे भाव होणार नाही, वाजवी भावात उत्तम माल इथे मिळेल. आज भाजी न्याल, तर रोजचं भाजी न्यायला इथेच याल”. खाली भाज्यांची नावे व त्यांचा किलोचा भाव लिहिलेला होता.

मॅडम नी बोर्ड बघितला आणि म्हणाल्या १ किलो लाल टमाटे दे.

मॅडम : अरे आधीच बोर्ड दाखवायचा नाही का 

मुलगा : मॅडम, तुम्ही टमाटो चा रेट विचारलाच कुठे !

भाजी घेऊन मॅडम बाहेर पडल्या आणि बायको पण भाजी घेऊन बाहेर आली.

 मॅडम आणि दुकानदार मुलाचा संवाद, हे आपल्या सगळ्यांचेच विचारांची देवाण – घेवाण करण्याचे एक बोलके उदाहरण आहे. बऱ्याच वेळा आपले पण असेच होते. आपल्याला काय पाहिजे आहे किंवा आपल्याला काय सांगायचे आहे, हे समोरच्याला समजेल अशा भाषेत आपल्याला सांगता येत नाही. “नाही, मला असे म्हणायचे नव्हते”, “माझ्या म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता”, अशी लांबण नंतर सुरु होते. त्यामुळे समज – गैरसमज, वाद – विवाद, भांडण – तंटे, यांचे पेव फुटते / ताण – तणाव वाढतात. अशा घटना घरी घडतात, बाहेर घडतात, ऑफिस मध्ये घडतात. आणि त्याचे परिणाम आपण बघतोच आणि अनुभवतो.

म्हणूनच गुरुजन सांगतात : Be specific, Be to the point, Be brief.

आता यापुढे भाजीवाल्याशी संवाद साधतांना, तिथला बोर्ड बघून मग ठरवायला पाहिजे कि आपण काय विचारायला पाहिजे हे लक्षात आले.

चार दिवसांनंतर (तेच ठिकाण, साधारण तीच वेळ) —-

सकाळी फिरायला गेलो, डेअरी मध्ये दूध घेतले. बाजूच्या भाजीच्या दुकानात बायको भाजी घ्यायला गेली. मी तिथेच उभा होतो. तेवढ्यात एक मॅडम दुकानात आल्या, ‘अरे टमाटे कसे आहेत’ ? बघितलं तर या मॅडम वेगळ्या होत्या. मला वाटलं, की मुलगा आता भाव लिहिलेल्या बोर्ड कडे बोट दाखवेल. पण दुकानदार मुलगा व मॅडम यांची पुढची डायलॉग बाजी साधारण परवा सारखीच झाली. मॅडम स्मित हास्य करत, टमाटे घेऊन बाहेर पडल्या.

बायकोची भाजी घेऊन झाली. पैसे देतांना मी मुलाला विचारले —

मी : दादा, एक विचारू का ?

मुलगा : काका जरूर विचारा 

मी : टमाटे कसे आहेत विचारल्यावर, तुम्ही रेट म्हणजे भाव सांगायला पाहिजे ना ! अशी लांबण का लावता. एखादा गिऱ्हाईक चिडेल ना !

मुलगा : काका, you are absolutely right

मुलगा : काका, आमचा धंदा एकदम रुक्ष आहे. भाव सांगायचा, भाजी द्यायची आणि पैसे घ्यायचे. थोडे गंमतीशीर बोलायला किंवा ऐकायला मिळाले, तर तेवढीच मजा येते. दिवस छान जातो. येणाऱ्या प्रत्येक गिऱ्हाईकाची बोलण्याची पद्धत वेगळी असते. गिऱ्हाईकाच्या चेहेऱ्याकडे बघून मला समजते, की फिरकी घ्यावी का ! किंवा नाही काही गिऱ्हाईक पण माझी फिरकी घेतात. मजा येते. दुकानात उभी असलेली मंडळी पण काही वेळा चर्चेत भाग घेते. लोकांच्या आणि माझ्या चेहेऱ्यावर हास्य येते.

मी : (मुलाचं इंग्रजी वाक्य आणि विचार ऐकून मी अवाकच झालो) बरोबर आहे. मला ऐकतांना मजाच आली.

मुलगा : काका ‘joy and happiness is to be spread. Is it not !’ पण त्याकरता मजा happiness generate व्हायला पाहिजे ना ! तुम्हाला मजा आली. तुम्ही चार लोकांना सांगणार, एखादा लिहिणारा असेल तर तो whats app वर टाकणार आणि ते ५० जण वाचणार. This is the chain of joy.

मुलानी टोपलीतलं एक सुंदर मोठं सफरचंद माझ्या हातात दिलं आणि म्हणाला —

मुलगा : This is for you. This is for spreading the taste. तुम्ही दुकानात नेहेमी भाजी घेता, पण फळे कधी घेत नाही. आता पुढच्या वेळेला भाजी पण घ्याल आणि फळे पण. This is called spreading of business.

मी : वाह, क्या बात है ! दादा, चहा घेणार का ? 

मुलांनी होकार दिला आणि मी बाजूच्या दुकानदाराला खूण करून ३ कटिंग चहा मागवले.

चहाचे घोट घेतांना मुलाला म्हटलं : This is for spreading togetherness.

मुलाला थँक्स म्हणून आणि बाय करून आम्ही हसत हसत बाहेर पडलो.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ३४ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – – ३४ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

प्रश्न

। नृपस्य चित्तं कृपणस्य वित्तम्

 मनोरथा:  दुर्जनमानवानाम्

 त्रिया चरित्रं पुरुषस्य भाग्यम्

 देवो न जानति कुतो मनुष्य:।।

राजाचे मन, कंजुषाचे धन, दुर्जनाचे मनोरथ, स्त्रीचे चरित्र आणि पुरुषाचे भाग्य हे दैवाला सुद्धा जाणता आले नाही ते सामान्य मनुष्याला कसे काय उमगणार?

खरं आहे! एक सामान्य बुद्धीची व्यक्ती म्हणून मी जेव्हां जेव्हां रामायण, महाभारत आणि इतर अनेक ऐकलेल्या दंतकथांबद्दल विचार करते तेव्हा माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. तेव्हाही राहत होते आणि आजही तेच तेच प्रश्न मला पुन्हा पुन्हा पडतात.

अशा अनेक स्त्रिया ज्या मनावर स्वार आहेत..

आंधळ्या पतीसाठी आयुष्यभर डोळस असूनही डोळ्यावर पट्टी बांधून जगणारी गांधारी… हिला पतिव्रता म्हणायचं की जर ही धृतराष्ट्राचे डोळे बनून जगली असती तर वेगळे महाभारत घडू शकले असते का? पांडव आणि कौरवातले केवळ राज्यपदासाठीचे वैर मिटवता आले असतते का? कुरुक्षेत्रावरचं ते भयाण युद्ध टळलं असतं का?असा विचार करायचा?

कुंतीसारख्या महाराणीला जन्मभर दुर्वास ऋषीच्या क्रोधित शापवाणीमुळे लाभलेलं शापित मातृत्व का भोगावे लागले?

द्रौपदीने  पाच पांडवांचं पत्नीपद कसं निभवलं  असेल? नक्की कुणाशी ती मनोमन बांधली गेली होती? युधीष्ठीराबद्दल तिच्या मनात नक्कीच वैषम्य असणार आणि भीमाबद्दल आस्था. समान भावनेने पंचपतींचा तिने मनोमन स्विकार केला असेल का?

वृषालीने मनोमन कर्णावरच प्रेम केले. त्यावेळेच्या परिस्थितीनुसार कर्णाला दुसऱ्या स्त्रीशी विवाह करावा लागला तरीही वृषालीने पती म्हणून फक्त कर्णाचाच विचार मनात बाळगला.

अहिल्याचा कोणता दोष होता की, गौतमी ऋषीने केवळ त्यांच्या कुटीच्या वाटेवरून जाताना इंद्राला पाहिले आणि अहल्यावर व्यभिचाराचा आरोप ठेवून तिचे शापवाणीने पाषाणात रूपांतर केले आणि त्याच अहल्येचा कालांतराने रामाने उद्धार केला.

.. मीरा, राधा यांना आपण नक्की कोणत्या रूपात पाहतो? प्रेमिका की भक्तिणी की समर्पिता?

.. रामाबरोबर वनवासात गेलेल्या सीतेला एखाद्या सामान्य स्त्री सारखा कांचन मृगाचा लोभ का व्हावा?

.. रावणासारख्या असुराची  पत्नी मंदोदरीसाठी आपल्या मनात नक्कीच एक हळवा कोपरा आहे.

.. वालीची पत्नी तारा ही सुद्धा एक राजकारणी चतुर स्त्री म्हणूनच आपल्या मनात का राहते?

। अहल्या द्रौपदी तारा कुंती मंदोदरी 

पंचकन्या स्मरेत नित्यम | महापातक नाशनम्।।

…. हा श्लोक म्हणताना खरोखरच जाणवते की कोणत्याही कारणामुळे असेल, त्या त्या काळाच्या परिस्थितीमुळे असेल पण कुठला ना कुठला  कलंक चारित्र्यावर घेऊन जगणाऱ्या या स्त्रियांना काळानेच दैवत्व कसे दिले?

हे सगळे प्रश्न आजही अनुत्तरीतच आहेत. आणि म्हणूनच स्त्रीच्या चारित्र्याविषयी नेमकं काही ठरवताना जिथे देवही दुर्बल ठरले तिथे आपल्यासारख्यांचं काय?

पुरुषस्य भाग्यम्  हा सुद्धा असाच प्रश्न उभा करणारा  विषय आहे.

— रघुकुलोत्पन्न, सच्छील, मर्यादा पुरुष, एकपत्नीव्रती  पितृवचनी, बंधुप्रेमी, कर्तव्यपरायण रामाला  चौदा वर्षे वनवास का घडावा?

— राजा हरिश्चंद्रासारख्या सत्यप्रिय, वचनबद्ध, राज्यकर्त्याचे समस्त राज्य जाऊन त्याची दैना का व्हावी?

— भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्यांसारख्या महारथींना  दुर्योधनासारख्या अधर्मी व्यक्तीला कोणत्या लाचारीला बळी पडून साथ द्यावी लागली?

— युधिष्ठिराने  कौरवांसारख्या नीच वृत्तींबरोबर द्युताचा डाव मुळातच मांडलाच कशाला?

— आणि कौंतेय? सूर्यपुत्र, प्रचंड बलशाली, कवच कुंडल घेऊन जन्माला आलेल्या या कर्णाला सुतपुत्र म्हणून का जगावे लागले? परशुरामाचा शाप, इंद्राची चालाखी आणि अपात्र व्यक्तीशी मैत्रीच्या वचनात अडकलेल्या कर्णाचे भाग्य कसे भरकटत गेले हा केवळ जर— तरचाच प्रश्न उरतो.

— अर्जुनासारख्या धनुर्धराला  बृहन्नडा बनून स्रीवेषात वावरावे लागले.

— भीमाला गदेऐवजी हातात झारा घ्यावा लागला.. बल्लवाचार्याची भूमिका करावी लागली.

— कृष्णासारख्या युगंधराचाही शेवट मनाला थक्क करतोच ना?

— आणि वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी होतो हे सत्य केवळ कल्पनेच्या पलीकडचं नाही का?

अर्थात हे सर्व पुराणातलं आहे. पिढ्यानुपिढ्या ते आतापर्यंत आपल्याकडे जसंच्या तसं वाहत आलेलं आहे. पण या सर्व घटनांचा संदर्भ मानवाच्या सध्याच्या जीवनाशी आजही आहे. कुठे ना कुठे त्यांचे पडसाद आताच्या काळातही उमटलेले जाणवतात.

फूलन देवी पासून ते नरेंद्र मोदी इथपर्यंत ते उलगडता येतील.

जन्मतःच कुठलाही माणूस चांगला किंवा वाईट नसतोच. तो घडत जातो. एखाद्या व्यक्तीचे पूर्ण रूप जेव्हा आपल्याला दिसतं तेव्हा त्यामागे अनेक घटकांचा प्रभाव असतो. संस्कार, नितीअनितीच्या  ठोस आणि नंतर विस्कटत गेलेल्या कल्पना, भोवतालची परिस्थिती, त्यातून निर्माण झालेली अगतिकता, अपरिहार्यता किंवा ढळलेला जीवनपथ अशी अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे कुणाच्या चारित्र्याबद्दल अथवा भाग्याबद्दल जजमेंटल होणं हे नक्की चुकीचं ठरू शकत.

रेल्वे स्टेशनवर चहा विकणारा एखादा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो किंवा केवळ गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेली एखादी स्त्री नव्याने शुचिर्भूत  होऊन पिडीतांसाठी देवासमान ठरू शकते.

कुणाचं भाग्य कसं घडतं याविषयी मला एक सहज वाचलेली कथा आठवली ती थोडक्यात सांगते.

— दोन भाऊ असतात. त्यांचे वडील दारुडे व्यसनी असतात. दोन्ही भावांवर झालेले कौटुंबिक संस्कार हे तसे हीनच असतात. कालांतराने वडील मरतात. दोघे भाऊ आपापले जीवन वेगवेगळ्या मार्गावर जगू लागतात. एक भाऊ अट्टल गुन्हेगार आणि बापासारखा व्यसनी बनतो. मात्र दुसरा भाऊ स्वतःच्या सुशील वागण्याने समाजात प्रतिष्ठा मिळवतो. हे कसे? त्यावर उत्तर देताना व्यसनी भाऊ म्हणतो, ” आयुष्यभर वडिलांना नशेतच पाहिलं त्याचाच हा परिणाम. ”

पण दुसरा भाऊ म्हणतो, ” वडिलांना आयुष्यभर नशेतच पाहिलं आणि तेव्हांच ठरवलं हे असं जीवन आपण जगायचं नाही. याच्या विरुद्ध मार्गावर जायचा प्रयत्न करायचा आणि ते जमलं ”

म्हणूनच भाग्य ठरवताना कुळ, गोत्र खानदान, संपत्ती, शिक्षण अगदी सुसंस्कार हे सारे घटक बेगडी आहेत. विचारधारा महत्त्वाची आणि त्यावरच चारित्र्य आणि भाग्य ठरलेले आहे. मात्र कुणी कसा विचार करावा हे ना कुणाच्या हातात ना कोणाच्या आवाक्यात. बुद्धिपलीकडच्याच या गोष्टी आहेत 

या श्लोकाचा उहापोह  करताना मी शेवटी इतकेच म्हणेन की,

* दैव जाणिले कुणी 

लवांकुशाचा हलवी पाळणा वनी वाल्मिकी मुनी…।।

— तेव्हा जजमेंटल  कधीच होऊ नका. काही निष्कर्ष काढण्याआधी  वेट अँड वॉच.

अहो जे देवालाही  समजले नाही ते तुम्हा आम्हाला कसे कळेल?

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “वेळेचा वेळ…” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ “वेळेचा वेळ…” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

नेहमीच माझ्या पुढे पळणाऱ्या वेळेला एकदा खूप खूऽऽप खूऽऽऽप वेगात जाऊन गाठलेच कसेबसे •••आणि काय सांगू तुम्हाला••• अहो हा पकडलेला वेळ, माझ्या मुठीत राहील तर शपथ! मला त्याच्या बद्दल खूप कुतूहल••• खूप कौतुक••• त्याच्या विविध कला पाहून तर मी वेळेच्या प्रेमातच पडले•••पण त्याला निरखे पारखेपर्यंत निघूनच गेला•••

वेळच तो••• कोणीतरी स्वत:हून आपल्या मागे पडतोय म्हणल्यावर; त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा स्वभावच त्याचा••• मला कसलेही महत्व न देता, माझ्या मुठीतून सुटलाच लेकाचा•••

अरे देवा••• काय करू? कसे करू? मला तर वेळ पाहिजेच आहे••• अरे वेळा, •••किती वेळा तुझी आर्जव करू? •••मला फक्त माझ्यासाठी म्हणून तू हवा आहेस••• तू माझ्या जवळ असला तरी, घरच्यांसाठी••• ऑफिस साठी••• इतर कामासाठी••• मी तुझी विभागणी करते •••आणि मग शेवटी, माझ्यासाठी तू राहातच नाहीस••• माझ्यासाठीही तू रहावस म्हणून, मी खूप आटापिटा करते••• काहीही करून माझ्यासाठी तुझा वेळ घ्यायचाच म्हणते••• पण खूप धावपळ, दमछाक करूनही, माझ्यासाठी म्हणून तू गवसतच नाहीस•••

अरे, बघ जरा इतर प्रियकराकडे••• आपल्या प्रेयसीचा शब्द कसे झेलतात••• त्यांच्यासाठी काय काय करतात••• आणि तू •••? मी तुझ्या प्रेमात ईतकी व्याकूळ होऊनही तुझ्यापर्यंत माझे प्रेम कसे पोहोचत नाही? मागून मागून काय मागते तुझ्याकडे? फक्त तुझा थोडा वेळ ना •••पण अरे वेळा, तुझ्याकडे मला वेळ भेट द्यायला वेळच नाही••• तुझे हेच वैशिष्ट्य आहे ना••• ते मला आकर्षित करते तुझ्याकडे •••आणि मग मी तुझ्याच प्रेमात अधिकाधिक पडते•••

तू माझ्यासाठी रहावास, •••मी तुझ्याबरोबर वेळ घालवावा••• म्हणून माझी सगळी कामे अगदी भराभर उरकते••• माझ्याकडे असलेला वेळ अपुरा पडू नये म्हणून, घरात इतर कामासाठी बाई लावून, तो वेळही वाचवण्याचा प्रयत्न करते •••पण काय जादू करतोस तू? कळतच नाही••• एक काम संपवावे, तर दुसरे काम दत्त म्हणून हजर असते •••मग त्यासाठी नाईलाज म्हणून वेळ द्यावाच लागतो••• तरी ते काम उरकून, मग मी तुझ्या सोबत राहीन••• असे वाटून ते काम उरकते••• तर मुलांना काहीतरी खायची हुक्की येते••• त्यांचा गृहपाठ •••कोणीतरी पाहुणे येण्याचा फोन •••किंवा इतर काहीतरी••• मग ती वेळ, साजरी करण्यासाठी, त्या वेळेत त्या वेळे प्रमाणे नाचणे •••माझे माझ्या प्रियकराला, वेळेला भेटायचे राहूनच जाते••• मग काहीही झाले तरी उद्या आपण आपल्या वेळेला भेटू••• अशी स्वतःची समजूत घालून, स्वप्नातच वेळेला भेटून घेते •••पण तेथेही माझी मुले शिकून मोठी होतील••• चांगली साहेब होतील•••त्यांचे सगळे खूप छान छान चालले आहे••• मला कसलीच काळजी नाही •••असलीच स्वप्ने दाखवून माझ्यासाठी वेळ मला मिळतच नाही•••

काय मी करू? कसा तुझ्याशी संवाद साधू? मला माझे काही छंद जोपासायचे आहेत••• त्यासाठी तुझी मदत मला पाहिजे आहे •••काय म्हणतोस? मग तू इतरांकडे माग वेळ••• तुला काय वाटतं? मी हे केलं नसेल? पण अरे, आजकालच्या जगात, दुसऱ्यांना देण्यासाठी म्हणून कोणाकडेच वेळ नाही रे••• म्हणून तर तुझ्याच मागे लागायचे••• तुझीच आर्जव करायची•••

हल्ली मोबाईल रुपी यंत्र, मंत्र, का मित्र आला आहे ना •••त्यामुळे खरंच लोकांचा खूप वेळ वाचत आहे••• त्यांची बरीच धावपळ कमी झाली आहे••• पण••• मग काय? त्यातच असणाऱ्या गेम्स मध्ये, वेगवेगळ्या ॲप्स मध्ये, ते इतके गुरफटून जातात••• का स्वतःला गुरफटून घेतात••• माहीत नाही •••पण त्यांच्याकडे दुसऱ्यांना द्यायला वेळ नाही••• स्वतःला साठी असलेला वेळ, मस्त टाईमपास करण्यात घालवतात •••पण दुसऱ्यासाठी त्याचा उपयोग करावा असा विचारही मनात येत नाही••• अशी वेळ ••• ••• तूचतर त्यांच्यावर आणली नाहीस ना?

प्रियकरावर नि:संशयपणे प्रेम करावे••• असे असताना सुद्धा, माझ्या वेळेच्या प्रियकरावर मला संशय येऊ लागलाय••• पण••• विश्वासाने सगळे काही मिळते••• यावरही माझा विश्वास असल्याने, मला माझा असा वेळ मिळेलच••• अशी खात्री करून घेते••• आणि तुझ्यावर प्रेम करणे, अखंड चालूच ठेवते•••

पण पुढे असणारा वेळ मी पकडू शकत नाही••• मागे पडलेला वेळ मला सोडावाच लागतो••• आताच्या परिस्थितीतच तू मला पाहिजे आहेस••• माझी व्याकुळता जाणून घेनारे जरा••• मी एवढी काकुळतीला आली आहे म्हटल्यावर, तुला माझी दया आली •••काल खरच माझ्या स्वप्नात, माझ्यासाठी असलेला वेळ होऊन आलास••• मला भेटलास ••• मला म्हणालास, मी तुझे दुःख जाणले••• मग माझे पण दुःख तुला सांगावेसे वाटते••• ऐकशील?

अहाहा••• माझा प्रियकर••• माझ्यासाठी आला आहे••• मग त्याच्यावर प्रेम करायचे तर, त्याच्या ही व्यथा जाणून घ्यायलाच हव्यात ना? •••मग मी अगदी कान टवकारून, जीव एकाग्र करून, त्याचा हात माझ्या हातात घेऊन, म्हटले••• सांग ना••• मला आवडेल ऐकायला•••

तसा वेळ सांगू लागला ••• देवाने जसे तुला जन्माला घातले ना••• तसेच मलाही जन्माला घातले••• तुला बुद्धी तरी दिली आहे••• एक अभिव्यक्ती दिली आहे •••वेगवेगळे अवयव दिले आहेत••• पण माझे काय? जगातील इतके चराचर आहेत••• त्या सगळ्यां साठी चोवीस तास! ••••••• त्यात मला ना आकार••• ना मला काही करण्याचे स्वातंत्र्य••• कोणासाठी काय करायचे •••काय नाही •••हे मी ठरवत नाही •••तरी माझ्याकडूनच सगळ्या अपेक्षा ठेवून अक्षरश: जो-तो माझे लचके तोडत आहे ••• माझे असे लचके तोडणे आता सहन होत नाही••• म्हणून सगळ्यांच्याच पुढे मी धावत राहतो••• मला धावावे लागते••• कारण कोणाच्या हाताला लागलो, की लगेच लचका तोडला जातो •••काय करू मी तरी? जाऊ दे मला••• नाही तर अजून किती जण एकदम तुटून पडतील माझ्यावर •••काही सांगता येत नाही•••

हांऽऽऽऽ पण तुझे माझ्यावरचे प्रेम पाहून, मी खूप सुखावलो आहे••• म्हणूनच माझा वेळ तुझ्यासाठी देण्यासाठी, मी तुला एक कानमंत्र देतो••• बघ तू••• तुलाही वेळ मिळेल••• बघ •••आपल्या वेळेचे नाही, तर कामाचे विभाजन योग्य पद्धतीने कर••• आणि आपली कामे, पूर्ण जबाबदारीने करताना, ठामपणे इतरांनाही सांग••• मी माझी जबाबदारी, माझे कर्तव्य, पूर्ण केले आहे •••आता चोवीस तासांपैकी काही वेळ तरी, मी माझा म्हणून व्यतीत करणार आहे •••एक स्त्री असलीस तरी••• तो तुझा अधिकार आहे••• हक्क आहे••• आणि तो प्रत्येकाने मिळवला पाहिजे••• बघ तू मग••• तुझ्या हातात हात घालून, तू ठरवलेल्या वेळेत, हा वेळ फक्त तुला वेळ देईल•••

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हलकं फुलकं काही… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य)  ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ हलकं फुलकं काही… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

हलकं फुलकं काही….

निसर्ग आपल्याला मुक्त हस्ताने अनेक गोष्टी देत असतो…

शुद्ध हवा, पाणी, गारवा, फुलं, फळं आणि बरेच काही…..

देणं हा निसर्गाचा गुण आहे….

अनेक गुण अंगी यावेत म्हणून मनुष्य प्रयत्न करीत असतो….

देणाऱ्यांचा हात नेहमी वर असतो आणि घेणाऱ्याचा खाली…

आपला हात कायम वर रहावा असं वाटतं असेल तर आपण द्यायला सुरुवात केली पाहिजे…..

पटतंय ना?

आजचा दिवस आनंदाचा आहे…

© श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “गौरीताई…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “गौरीताई…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

माझी नातं पहिलीत असतानाची गोष्ट. शाळा सुटल्यावर संध्याकाळी रोज मी तिला बाल रंजन केंद्रावर घेऊन जातं असे.

तिथे मुलांचे छोटे छोटे वयानुसार गट केले जातं असतं. अठरा एकोणीस वर्षाच्या मुली… म्हणजे

“ताई” या मुलांना खेळ शिकवतं असतं. प्रार्थना, श्लोक, गाणी, गोष्टी, व्यायाम, ग्राउंड ला चक्कर असे तिथे चालतं असे.

त्या दिवशी गेले तर तिथल्या प्रमुख बाईंनी आमच्या ग्रुपला सांगितले की..

“नेहमीची ताई एक महिना रजेवर आहे. तर ही नवीन गौरीताई मुलांना महिनाभर शिकवणार आहे. “.

पाच फुटाची, सावळी, एकदम हडकुळी पण तरतरीत अशी मुलगी समोर आली. तिने आम्हा सर्वांना नमस्कार केला. मुलांना म्हणाली,

“बच्चे कंपनी चलो”

मुलं तिच्यामागे गेली. आम्ही पालक नेहमीप्रमाणे कट्यावर जाऊन बसलो.

एक आजोबा म्हणाले,

“ही एवढीशी तर पोरगी आहे… ही काय शिकवणार मुलांना? “

“हो न… हिला पाहिल्यावर माझ्याही हेच मनात आलं” दुसरे एकजण म्हणाले.

झालं… लगेचच तिच्या दिसण्यावरून अजून एक दोघांनीही कुठल्या कुठल्या कॉमेंट्स केल्या….

एक जण तर स्पष्ट म्हणाली,

” आपण मॅडमना सांगु ही मुलगी आमच्या ग्रुपला ताई म्हणून नको “…

“लगेच आजचं सांगायच”

” कोणीतरी म्हटलं चार दिवस जाऊ दे मग बघू…. नंतर सांगू”

तिला बघितल्याबरोबर अशी सगळी चर्चा झाली.

जरा वेळाने बघितलं तर आज राऊंड घेताना मुलं वेगळीच पळत होती. हसण्याचा आवाज ऐकू येत होता.

मुलं आज नेहमीपेक्षा जास्त आनंदात होती.

गौरीताई काहीतरी सांगत होती मुलं शांतपणे ऐकत होती. मधेच मुलांचा एकदमच ओरडण्याचा आवाज ऐकू आला…. नंतर मात्र मुलं फार हसत होती. आम्ही लांब बसलो होतो त्यामुळे काय चाललं आहे हे समजत नव्हते.

घरी निघताना मुलं गौरी ताईला अच्छा, टाटा, बाय-बाय करत होती. माझी नातं तर फार खुश होती. घरी जाताना रस्ताभर गौरीताईच कौतुक सुरू होत..

” गौरीताईंनी आज आम्हाला तुरुतुरु चालायला शिकवलं. इतकी मज्जा आली…. “

” तुरुतुरु ” हा शब्द तर तिला फारच आवडला होता.

” आजी गौरीताईंनी वाघाची गोष्ट सांगितली तिने वाघाचा आवाज काढला. आम्हाला तर भीतीच वाटली होती”

” म्हणून तुम्ही मगाशी ओरडत होता का”

” अग हो… ती म्हणाली मागे बघा खरंच वाघोबा आलेला आहे. आम्ही सगळ्यांनी मागे बघितलं तेव्हा ताई हसत होती. “

दुसरे दिवशी ग्राउंड वर जाताना नातं भलतीच उत्साहात होती. दरवाजातच माझा हात सोडून ती गौरीताई कडे पळाली.

गौरी मजा… मजा करत मुलांना शिकवत होती. आज दोन्ही हातांच्या मुठी हनुवटी खाली धरून तिने मुलांना पळायला सांगितले. मुले मस्त हसत होती…. गंमत करत होती… त्यांना हे वेगळं खेळणं आवडलं होतं. एकदा तिने मुलांना लुटुलुटू चालायला सांगितलं. खरंतर चालणं नेहमीच होतं पण लुटुलुटु शब्दाची मुलांना फार गंमत वाटत होती.

सगळ्यांना गोल उभ करून तिने हात पकडायला लावले. एक-दोन-तीन म्हटलं की सगळ्यांनी मध्यभागी जवळ यायचं चार-पाच सहा म्हटलं की लांब जायचं अशी खेळण्यात तिनी गंमत आणली होती.

गौरीला रोज नवीन काहीतरी सुचायचे. गोष्ट अगदी छोटीशीच असायची… पण त्यातल्या वेगळे पणाने मुलं त्यात रंगून जायची.. गुंगून जायची…

काही दिवसातच गौरीताई सगळ्यांची लाडकी झाली होती. बघता बघता महिना संपला. आज तिचा शेवटचा दिवस होता.

मुलांना वाईट वाटत होतं. ताई आता येणार नाही, परत भेटणार नाही म्हणून मुलांना खरोखरं रडू येत होतं.

तिचेही डोळे भरून आले होते. ती छोटीशी हडकुळी सावळी गौरी समोर होती…..

मुलं म्हणत होती,

” गौरीताई तुच आम्हाला शिकव ना “

“ताई किती छान आहे”

” ताई तु मला फार आवडतेस”

“ताई तु जाऊ नको ना”

ताई तुच आम्हाला हवी आहेस”

” ताई किती छान शिकवते”

मुलं अक्षरशः तिच्या ड्रेसला पकडून गोल उभी होती….

ती दोन्ही हातांनी मुलांना जवळ घेत होती. त्यांच्या पाठीवरून डोक्यावरून, गालावरून… हात फिरवत होती…

सगळ्या मुलांचा निरोप घेऊन ती निघाली…

तिचेही डोळे वहात होते…

ती लांबवर जाईपर्यंत मुलं हात हलवत उभी होती…

मी बघत होते…

माझ्या मनात विचार आला..

या मुलीकडे बघून आम्ही कधी असं म्हणू का? तिला पहिल्यांदा बघितल्यानंतर केलेल्या कॉमेंट्स मला आठवल्या.

या छोट्या मुलांना तिच्या रंग, रूपाचं, ऊंचीच काहीही देणघेणं नव्हतं…

ते तिच्या गुणाच्या प्रेमात पडले होते. तिच गुणगान करत होते… निखळं आणि निर्मळं मनाने… तिच्याकडे पाहत होते.

मुलं खरचं निरागस होती.. मनानी स्वच्छ होती..

त्या सात आठ वर्षाच्या मुलांकडे जे सात्विक निर्मळ मन होतं ते आमचा होतं का? तर खरचं नव्हते…

त्यांच वागणं बघुन मला आम्ही काय करायला हवे आहे हे समजले. त्यांच्याकडून काय शिकायला हवे हे पण समजले…

आम्ही अगदी वरवरचं बाह्यरूप बघतो आणि लगेच कोणालाही सहज प्रतिक्रिया देतो… ती ताना त्याला काय वाटेल किंवा तिला काय वाटेल याचा आम्ही कधी विचारही करत नाही.

” किती बारीक झाली आहे “

नाहीतर… ” किती जाड झाली आहे”

” केस किती गेले टक्कल पडायला लागले. “

“केस पांढरे झाले आहेत.. “

“डाय तरी करायचा “

“ही नीटच राहत नाही “

“कसले कपडे घातले आहेत”

” ईतक्यातच चष्मा लागला का? “

” पोट किती सुटलय… “

वगैरे वगैरे…..

तशी यादी खूपच मोठी आहे…

किती आणि काय लिहु… आणि तुम्हाला ती माहित आहे….

हे आठवले म्हणूनच आज आठवणींच्या पेटीतून गौरीताईला बाहेर काढलं…. त्या एक महिन्यात मी तिच्याकडूनही काही गोष्टी शिकले. म्हणूनच मी पण तिला गौरीताईच म्हणणार…

तिची गोष्ट तुम्हाला पण सांगावी म्हणून सांगितली…

नुसती गोष्टच तुम्हाला सांगायची होती का? ….

मला काय म्हणायचे आहे हे तुम्हाला आता कळलेलेच आहे…

तसे… तुम्ही सुज्ञ आहातच…. करा विचार…

सांगायला नकोच….

थांबते इथे….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ४ पैसे कमवणे म्हणजे काय ? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

⭐ मनमंजुषेतून ⭐

☆ ४ पैसे कमवणे म्हणजे काय – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

४ पैसे कमवणे म्हणजे काय ?

मुलाने काही कमावले तर ४ पैसे घरात येतील

किंवा

४ पैसा मिळवण्यासाठी माणूस रात्रंदिवस काम करतो.

मग या तथाकथित पैशांमध्ये केवळ ४ पैसे का ?

३ किंवा ५ पैसे का नाहीत हा प्रश्न आहे.. ?

चला तर मग वडिलधाऱ्यांकडून उपरोधिक तपशील जाणून घेऊन ‘ ४ पैसे कमवा ‘ ही म्हण समजून घेऊ या.

पहिला पैसा

विहिरीत टाकण्यासाठी.

दुसरा पैसा 

कर्ज फेडणे.

तिसरा पैसा 

पुढचे देणे भरणे

चौथा पैसा

भविष्यासाठी जमा करणे

या प्रकरणाची गुंतागुंत सविस्तरपणे समजून घेऊ या.

 

१. विहिरीत एक पैसा टाकणे.

म्हणजे

स्वतःच्या कुटुंबाची आणि मुलांची पोटे भरण्यासाठी वापरणे.

२. कर्ज फेडण्यासाठी दुसरा पैसा वापरा.

आई-वडिलांच्या सेवेसाठी.. ,

ते ऋण फेडण्यासाठी त्यांनी आमची काळजी घेतली, आमचे पालनपोषण केले आणि मोठे केले.

३. पुढील (मुलांचे) कर्ज फेडण्यासाठी तिसरा पैसा वापरणे.

तुमच्या मुलांना शिक्षित करा, त्यांना उच्च शिक्षणासाठी पैसे मोजा.

(म्हणजे भविष्यातील कर्ज)

४. चौथा पैसा पुढील (पुण्य) ठेवीसाठी वापरणे.

म्हणजे शुभ प्रसंग, अशुभ प्रसंग, परोपकाराच्या अर्थाने, संतांची सेवा करणे आणि असहायांना मदत करणे या अर्थाने.. !

तर.. ही ४ पैसे कमावणारी गोष्ट आहे. आपल्या प्राचीन कथांमध्ये किती उच्च विचार आहेत..!

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित 

सांगली – ४१६ ४१६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares