मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बोलता बोलता भाग 3 ☆ श्री सुधीर गाडगीळ

? मनमंजुषेतून ?

☆ बोलता बोलता भाग 3 ☆ श्री सुधीर गाडगीळ ☆

दृष्टीआडच्या अशा असंख्य कहाण्या मी अनुभवल्या आहेत. साऱ्याच सांगणं वर्तमानपत्राच्या मर्यादेत शक्य नाही. पुस्तकंच होतील, कारण राजकारण, सिनेमा, साहित्य, नाटक, खेळ, सामाजिक क्षेत्र, गायक-संगीतकार, चित्रकार, शास्त्रज्ञ, इतिहासकार, अशा सुमारे तीन-साडेतीन हजार व्यक्तींच्या प्रकट वा कॅमेऱ्यापुढे मुलाखती मी घेतलेल्या आहेत. आजही वीज न वापरता अंधारात राहून पंधरा-वीस विद्यार्थिनींना डॉक्टरेटसाठी मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापिका सानेबाईंपासून, बिझिनेस समजून देणाऱ्या रस्त्यावरच्या भंगारवालीपर्यंत अनेक ‘मुद्रा’ मी ‘बोलक्या’ केलेल्या आहेत. पत्रकारितेची नोकरी नि कॉस्टिंगचा अभ्यास अर्धवट सोडून देऊन, पूर्णवेळ निवेदन आणि मुलाखतींचे ‘टॉक शो’ करायला लागून आता चाळीस वर्षे होतील. मराठीत पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून निवेदन करायला लागून माझी २५ वर्षं झाली तेव्हा २००० मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: पुण्यात येऊन ‘बालगंधर्व’मध्ये माझ्या आगळ्या करिअरच्या रौप्यमहोत्सवात मला ‘दाद’ दिलीय. फक्त गाणं किंवा गझल कार्यक्रमाचं ‘निवेदन’ मर्यादित न ठेवता, गाण्याच्या कार्यक्रमाच्या नवनव्या संकल्पना मी रंगमंचावर साकारल्या आणि निवेदन- मुलाखतीत फक्त भाषांचं वैविध्य आणण्याचा अट्टहास न करता, विषयांचं, माणसांचं वैविध्य आणून, मुलाखतीचे तीन हजार आणि गाण्यांचे दोन हजार कार्यक्रम केले म्हणून या वेगळ्या प्रयोजनासाठी, शरद पवार, आशा भोसले यांच्या उपस्थितीत, अमिन सयानीच्या आवाजात, सतीश देसाईंनी मला ‘पुण्यभूषण पुरस्कार’ही दिला हे मी माझं परमभाग्य समजतो.

नोकरी सोडून देऊन हे आगळं करिअर करायला उद्युक्त करणारी माझी पत्नी शैला ऊर्फ अनघा या गौरवसोहळ्यांच्या वेळी या जगातच नव्हती, एवढीच खेदाची बाब ! पस्तीस-चाळीस वर्षांपूर्वी आताचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि मी, दोघेही मध्यमवर्गीय घरातले– आम्ही दोघांनी आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याकरिता, एकाच दिवशी नोकरी सोडली. तेव्हा संपादकीय नोकरीचा राजीनामा देऊन घरी आल्यावर माझी पत्नी अनघा ऊर्फ शैला मला म्हणाली होती, ‘‘ बरं झालं नोकरी सोडलीत. तुमचा तो पिंडच नाही. आता मनाप्रमाणे कलेचं करिअर करा. जर काही आर्थिक अडचण आली तर आपण आपल्या गरजा कमी करू.’’ एखाद्या बाईनं ‘गरजा’ कमी करू म्हणून प्रोत्साहित करणं फारच मोलाचं होतं. मिळालेल्या यशामागे, कुटुंबाची साथ, मित्रांचं पाठबळ, जोडलेल्या माणसांचं सहकार्य, एकाच वेळी पहाटे बातम्या देणं, दुपारी जाहिरातींची भाषांतरं करणं, संध्याकाळी ‘दूरदर्शन’वर नव्या संकल्पनांतून कार्यक्रम करणं (अरुण काकतकर, विनय आपटे, विजया जोगळेकर यांच्या साथीनं) रात्री गाण्याच्या कार्यक्रमाच्या निवेदनाला जाणं, असं व्यस्त वेळापत्रक अखंड, न कुरकुरता, न आळस करता केलं हा भाग आहेच. सतत माणसांना भेटणं, माणसांचं वाचन आणि पुस्तकांचं वाचन यातून सतर्कता कायम ठेवत, पत्रकारितेच्या पार्श्वभूमीमुळे मिळालेल्या दिशेतून संदर्भ साहित्याचा साठा जमा करत, तो स्मरणात ठेवत, क्वचित उत्स्फूर्तपणातून विनोद साधत, वातावरण जिवंत ठेवत, असंख्य कार्यक्रम रंगवू शकलोय. उत्स्फूर्त गंमत सहज सुचत नाही. त्यासाठी उत्तम वक्त्यांच्या शब्दखेळीचे ऐकण्याचे संस्कार व्हावे लागतात. बाळशास्त्री हरदास, आफळेबुवा, कोल्हटकरबुवा यांच्या प्रवचन-कीर्तनातून, दत्तो वामन पोतदार ते पु. ल. देशपांडे यांच्यासारख्यांच्या उत्स्फूर्त बोलीतून, ऐकता ऐकता बोलीभाषेचे नि उत्स्फूर्त शैलीचे संस्कार माझ्यावर घडलेले आहेत.

पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरून निवृत्त झालेले दत्तो वामन पोतदार एका सायंकाळी साहित्य परिषदेत व्याख्यानाला आले. ते बोलायला उभे राहणार, एवढय़ात शेजारी बसलेले कथाकार श्री. ज. जोशी त्यांना म्हणाले, ‘‘दादा, आज तरी तुम्ही शिवचरित्र कधी लिहिणार ते सांगून टाका.’’ दत्तो वामन उपरणं सरसावत उभे राहिले, म्हणाले, ‘‘मी विद्यापीठातून निवृत्त झालो. मोकळा होतो. काही तरी बरं ऐकायला मिळेल म्हणून इथे आलो, पण काहीही नवं ऐकायला मिळालं नाही. आता बोलणार तर जोशीबुवांनी शिवचरित्राचे वक्तव्य केले. मी त्यांना सांगू इच्छितो की, जोशीबुवा, शिवचरित्र लिहिणं हे भाषांतरित कथा-कादंबरी लिहिण्याइतकं सोप्पं नाही. त्यासाठी चिंतन लागतं. विचार लागतो.. वेळ लागतो..’’ अशा बौद्धिक जुगलबंदी ऐकल्याने, मी बोलण्याचा व्यवसाय सुरू केल्यावर, वाटेला जाणाऱ्यांना अपमान होऊ न देता, शब्दातून टोलवत ‘दाद’ मिळवू शकलो.

 

© श्री सुधीर गाडगीळ 

पत्रकार,  निवेदक 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बोलता बोलता भाग 2 ☆ श्री सुधीर गाडगीळ

? मनमंजुषेतून ?

☆ बोलता बोलता भाग 2 ☆ श्री सुधीर गाडगीळ ☆

 १९९९ मध्ये सॅनहोजेजवळ (अमेरिकेत) बृहन्महाराष्ट्र अधिवेशनात मी आदल्या रात्री माधुरी दीक्षितची पाच हजार रसिकांसमोर प्रकट मुलाखत घेतली आणि पाठोपाठ दुसऱ्या दिवशी त्याच व्यासपीठावर आशा भोसले यांच्याशी गप्पा आणि त्यांचं गाणं होतं. कार्यक्रम सुरू करत असताना, अचानक आशाताई माझ्या दंडाला धरून स्टेजपुढे नेत, प्रेक्षकांना म्हणाल्या, ‘काल यानं (सुधीरनं) तुमच्या डोळ्यांना आनंद दिला. आज मी तुमच्या ‘कानांना’ आनंद देणार आहे.’ नमनालाच तुफान हशा. आशाताईंची उत्तम गाण्यापलीकडची ही बोलण्यातली उत्स्फूर्तता ‘शो’ रंगणार याची ग्वाहीच देऊन गेली.

ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवार मुंबईचा बाडबिस्तारा गुंडाळून, पुण्याच्या बाणेर रस्त्यावर, सर्जा हॉटेलच्या पुढच्या बाजूला एका कॉलनीतल्या फ्लॅटमध्ये राहायला आल्या. एकटय़ाच होत्या. मी गप्पा मारायला गेलो. त्यांचं एकाकीपण पाहून मी त्यांना गप्पांच्या ओघात विचारलं, ‘‘बाई, लोकांच्या वयाची होत नाहीत एवढी वर्षे, म्हणजे साठ वर्षे तुमची अभिनय करण्यात गेली. कॅमेरा.. टेक टू.. स्टार्ट.. असं इतकी वर्षे सातत्याने ऐकत आलात. इथे या फ्लॅटमध्ये एकटं मूक बसून राहण्यानं तुम्हाला गुदमरल्यासारखं होत नाही का? त्यावर ललिताबाई हसत म्हणाल्या, ‘‘अरे इथे मी दांडीवर कपडा वाळत घालते, स्वयंपाक करते, तेव्हा या घरात माझ्यापाठी कॅमेराच लागलाय, असं मी समजते. हा स्वयंपाकघराचा सेट लागलाय, असंच गृहीत धरते. मनाच्या या खेळामुळे मी इथेही शूटिंगच्या-कॅमेऱ्याच्या जगापासून दूर गेलेलेच नसते. म्हणून इथंही एकटी रमते.’’ दुर्दैवानं त्याच फ्लॅटमध्ये त्या गेल्या, पण तीन दिवस कुणालाही त्याचा पत्ता लागला नव्हता.

एका चित्रकला प्रदर्शनाचं उद्घाटन होतं. पु. ल. देशपांडे आणि बासुदा प्रमुख पाहुणे होते. उद्घाटन सोहळ्याच्या नमनाला आयोजक आगाऊपणे म्हणाले की, प्रदर्शन चित्रकलेचं आहे. पण यातला एक पाहुणा सिनेमातला, एक नाटकातला. दोघांनी कधी हाती ब्रश धरलेला नसेल. त्याचं वाक्य ऐकताक्षणी, पुलं प्रेक्षकांकडे बघत, हातात ब्रश धरून दाढी करत असल्याची अ‍ॅक्शन घेत, उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘‘हे काय रोज ब्रश हाती धरतो की.’’ हशा उसळला आणि नमनाचं आगाऊ बोलणाऱ्याचा चेहरा उतरला. पुढची कडी म्हणजे त्या तिथे पुलंनी भाषण करण्याऐवजी हाती ब्रश घेऊन, समोरच्या बोर्डावरच्या कोऱ्या कागदावर, तीन मिनिटांत, चार फटकारे मारत ‘महात्मा गांधी’ चितारले. टाळ्यांचा कडकडाट झाला. वर म्हणतात कसे? ‘‘मित्रहो, मी काही चित्रकार नाही. शिकलेलो नाही. तेव्हा चित्र चुकलं तरी कुणी नाव ठेवू नये, म्हणून मुद्दामच ‘गांधी’ चितारले.’’  पुन्हा हशा. माझं भाग्य असं की, त्या समारंभात नंतर बोलायला मी होतो म्हणून, ‘गांधीं’चं ते चित्र त्यांनी मला जाण्यापूर्वी भेट दिलं. १९७८ मध्ये ‘पुलं’नी काढलेले ते ‘महात्मा गांधी’ माझ्या दर्शनी हॉलमधल्या भिंतीवर आजही आहेत.

‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’ चित्रपटाच्या सेटवर आम्हा त्या काळच्या चित्रपट स्तंभलेखकांना दादा कोंडके यांनी कुटुंबीयांसह सेटवर आमंत्रित केलं होतं. आम्ही गेलो. सेटवर माझ्या बायकोची मी दादांना ओळख करून देत होतो. म्हटलं, ‘ दादा, ही माझी बायको ’. माझा शब्द संपताक्षणी, दादा म्हणाले, ‘आयला, मग काल कोण होत्या?’ सेटवर हशा. असंख्य मुलाखतीतून भल्याभल्यांना निरुत्तर करणाऱ्या माझीच ‘बोलती’ दादांनी ‘बंद’ करून टाकली होती.

पुण्यात वानवडीला अपंग साहाय्यकारी संस्थेच्या कार्यक्रमात तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम भाषणाला उभे राहिले. मी निवेदक होतो. राष्ट्रपती- प्रोटोकॉलनुसार मी त्यांच्या विरुद्ध बाजूला एक पायरी खाली उभा होतो. कलामसाहेबांनी भाषण सुरू करण्यापूर्वी अचानक मला जवळ बोलावले. माझी ओळखही नाही. मला कळेना का बोलावतायत. मला म्हणाले, ‘‘ही अपंग मुलं पाहून मला एक कविता सुचतीय. भाषणापूर्वी मी कविता म्हणणार आहे. तुम्ही इथेच शेजारी उभं राहून ती ऐका. आणि लगेच तिचं मराठीत भाषांतर करा.’’ त्यांनी कविता म्हटली. मी भावानुवाद केला. म्हणजे ‘चिल्ड्रेन्स ऑफ गॉड’ला ‘परमेश्वराची मुलं’ नं म्हणता ‘ईश्वराची लेकरं’ असा अनुवाद ऐकवला. टाळ्या पडल्या. त्यामुळे कलामसाहेबांना वाटलं आपली कविता नीट पोहोचली. त्यामुळे भाषण संपल्यावर त्यांनी मला पुन्हा बोलावलं. प्रोटोकॉल बाजूला ठेवून, मला घेऊन स्टेजखाली उतरले. सिक्युरिटीला दोन खुर्च्या शेजारी ठेवायला सांगितल्या. मला म्हणाले, ‘‘बसा आणि त्या अपंग मुलांना पुढय़ात बोलवा. त्यांना सांगा की, आजोबांना काहीही प्रश्न विचारा. मुलं जे विचारतील ते मला इंग्रजीत सांगा आणि मी जी उत्तर देईन, ती मुलांना मराठीत ऐकवा.’’ पडद्यामागे घडलेल्या पण प्रेक्षकांच्या पुढय़ात प्रत्यक्षात आलेल्या या घटनेमुळे प्रोटोकॉल बाजूला सारून मला कलामसाहेबांसारख्या राष्ट्रपतींच्या शेजारी बसून, राष्ट्रपती आणि अपंग मुलं यांच्यात ‘दुभाषी’ म्हणून काम करण्याचं भाग्य मिळालं.

© श्री सुधीर गाडगीळ 

पत्रकार,  निवेदक 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बोलता बोलता भाग 1 ☆ श्री सुधीर गाडगीळ

? मनमंजुषेतून ?

☆ बोलता बोलता भाग 1 ☆ श्री सुधीर गाडगीळ ☆

पत्रकारितेची नोकरी नि कॉस्टिंगचा अभ्यास अर्धवट सोडून देऊन, पूर्णवेळ निवेदन आणि मुलाखतींचे ‘टॉक शो’ करायला लागून आता चाळीस वर्षे होतील. मराठीत पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून निवेदन करायला लागून माझी २५ वर्षे पूर्ण झाली तेव्हा, २००० मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: पुण्यात येऊन ‘बालगंधर्व’मध्ये माझ्या आगळ्या करिअरच्या रौप्यमहोत्सवात मला ‘दाद’ दिलीय. फक्त गाणं किंवा गझल कार्यक्रमाचं ‘निवेदन’ मर्यादित न ठेवता, गाण्याच्या कार्यक्रमाच्या नवनव्या संकल्पना रंगमंचावर साकारल्या. आणि निवेदन- मुलाखतीत फक्त भाषांचं वैविध्य आणण्याचा अट्टहास न करता, विषयांचं, माणसांचं  वैविध्य आणून, मुलाखतीचे तीन हजार आणि गाण्यांचे दोन हजार कार्यक्रम केले म्हणून या वेगळ्या प्रयोजनासाठी, शरद पवार, आशा भोसले यांच्या उपस्थितीत, अमिन सयानीच्या ‘आवाजात’ सतीश देसाईंनी मला ‘पुण्यभूषण पुरस्कार’ही दिला हे मी माझं परमभाग्य समजतो.

ज्येष्ठ उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर ‘मुलाखत’ द्यायला फारसे उत्सुक नसत. त्यामागे त्यांचं  लॉजिकल कारण होतं. ते म्हणत, ‘आम्ही बनवतो काय, तर शेतात चालणारी इंजिनं. त्यांच्या आवाजातून ‘किर्लोस्कर’च बोलत असतात. वेगळं कशाला बोलायचं?’ पण चरित्रकार सविता भावे यांच्यामुळे माझी थेट शंतनुरावांशी भेट झाली. ‘लकाकी’ या पुण्याच्या मॉडेल कॉलनीतल्या बंगल्यावर हिरवळीवर दोन खुर्च्या समोरासमोर टाकून आम्ही मुलाखतीसाठी बसलो. पण ते त्यांच्या स्वभावानुसार खुलत नव्हते. त्यांचा एक वीकपॉइंट मला माहीत होता. त्यांना जगभरचे ‘ऑपेरे’ खूप आवडत. ‘ऑपेरा शो’ दाखवायला आणि तो कसा पाहावा, हे शिकवायला शंतनुरावांना आवडत असे. ते मुलाखतीत फार मोकळेपणाने बोलत नाहीयत, हे लक्षात आल्यावर मी त्यांना म्हटलं, ‘‘बाबा, मुलाखत राहू दे बाजूला. तुमच्याकडे सिडनीचा ऑपेरा आहे का हो !’’ ते एकदम खुलले. हिरवळीवरून ते मला आत बंगल्यात घेऊन गेले. दृकश्राव्य पडद्याची व्यवस्था केली आणि मला सिडनीचा ऑपेरा दाखवायला खुशीत सुरुवात केली. ते मूडमध्ये आले आहेत, हे ध्यानात घेऊन माझ्यातला मूळ पत्रकार जागा झाला आणि मी मनातले नियोजित प्रश्न, ऑपेरा पाहता पाहता, त्यांना विचारत गेलो. ते उत्तरं देत गेले. मी खूश. मुलाखतीच्या साफ नकाराकडून वीकपॉइंट काढताच, खुलून सगळी उत्तरं त्यांच्याकडून काढून घेतली. या आनंदात मी त्यांच्या बंगल्यातून बाहेर पडत असताना, किर्लोस्कर साहेबांनी मला पुन्हा बोलावलं आणि म्हणाले, ‘‘माझा वीकपॉइंट काढून, माझ्याकडून साऱ्या प्रश्नांची उत्तरं काढून घेतली, हे मला कळलंच नाही असं समजू नका. तुमचा अ‍ॅप्रोच आवडला म्हणून उत्तर दिलं. पुन्हा असं कुणाला गृहीत मात्र धरू नका.’’ माझ्यासाठी हा धडाच होता.

प्रत्यक्ष मुलाखतीपेक्षा अशा पडद्याआडच्या गोष्टीच या विविध क्षेत्रांतल्या अनेक मुलाखतींमधून शिकत गेलो. समोरच्याचा अंदाज, आवाका बांधण्याइतपत ही माणसं हुशार असल्यानेच, आपल्या क्षेत्रात क्रमांक एकच्या पदावर असतात, हे या ‘दृष्टीआडच्या सृष्टी’चा अनुभव घेताना मला कळत गेलं. गायकांच्या मुलाखती, गाण्यांचे कार्यक्रमही मी खूप केले. श्रेष्ठ गायकांच्या गाण्याचा आनंद तर मिळालाच, पण दौऱ्यांमध्ये गायक-गायिकांचा सहवास घडला. व्यक्तित्त्वाचे पदर उलगडले. गाण्यापलीकडचे पैलूही उलगडले..

पं. भीमसेन जोशीसाहेबांच्या ‘संतवाणी’ कार्यक्रमाचं ‘निरूपण’ मी काही काळ करत होतो. त्या काळी रात्री दहा वाजता कार्यक्रम थांबवण्याचं बंधन नव्हतं. पंडितजी मंडईमागच्या बांबूआळीत रस्त्यावर एकदा ‘संतवाणी’ सादर करत होते. रात्री दीड वाजता मैफल संपली. रस्ता निर्मनुष्य झाला. वादकांनी वाद्य मिटवली. बुवांनी मांडीवरची शाल काढली. आम्ही उठणार, एवढय़ात त्या उत्तररात्री निर्मनुष्य रस्त्यावरून एक हमाल गुरुजींकडे आला. बुवा त्याला म्हणाले, ‘ काय आवडलं का गाणं? ’ यावर तो वृद्ध हमाल उत्तरला, ‘‘आवडलं. पण ते ‘जो भजे..’ घ्यायला हवं होते.’’ यावर भीमसेनबुवा म्हणाले, ‘‘अस्सं. बरं..’’ त्यांनी पुन्हा वाद्यं लावायला लावली आणि मध्यरात्री पावणेदोन वाजता, त्या एकटय़ा हमालासाठी ‘जो भजे..’ म्हटलं. मला आजही त्या वृद्ध हमालाचे कृतज्ञतेने पाणावलेले डोळे आठवतात. अशा गोष्टींमुळेच, ‘भीमसेनअण्णा’ हे बंदिस्त मैफलीतल्या जाणकाराइतकेच, रस्त्यावरच्या कष्टकऱ्याच्या मनात रुजले. असे अनेक प्रसंग मनात घट्ट रुतून आहेत.

क्रमशः ….

© श्री सुधीर गाडगीळ 

पत्रकार,  निवेदक 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ खानदेशी पाहुणाचार…. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? मनमंजुषेतून ?

☆ खानदेशी पाहुणाचार… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

खानदेशी  पाहुणचार !

दरवर्षी हा थंडीचा सीझन संपता-संपता येणाऱ्या उन्हाळ्यात मला शिरपूरची आठवण येते. साधारणपणे चाळीस वर्षे झाली आम्हाला शिरपूर सोडून, पण तिथे राहिलेले एक-दीड वर्ष अजूनही मनाच्या कोपऱ्यात  आहे. पश्चिम महाराष्ट्रात राहणारे आम्ही बदलीच्या निमित्ताने खानदेशात शिरपूर  येथे गेलो. एकदम नवखा भाग, बरोबर दोन लहान मुले आणि आपल्या गावापासून खूप लांब त्यामुळे मनात टेन्शन होतेच! पण बघूया, जसं होईल तसं, म्हणून सामानासह शिरपूरला गेलो.

सरकारी दवाखान्याच्या आवारात असलेला मोठ्ठा ब्रिटिशकालीन बंगला आम्हाला राहायला होता. घरात सहा-सात खोल्या, वर कौलारू छप्पर, मोठ्या खिडक्या आणि दोन-तीन घराबाहेर जाता  येणारी दारे ! प्रथमदर्शनीच मन एकदम प्रसन्न झाले. बंगल्याच्या भोवतीच्या जागेत मोठे लिंबोणीचं झाड, गाडी लावायला गॅरेज, बसायला प्रशस्त अंगण आणि काय पाहिजे! हा दवाखाना गावापासून थोडा लांब एका टेकाडावर होता.  दवाखान्याभोवती डॉक्टरांचा बंगला आणि कंपाउंडर, नर्स, क्लार्क वगैरे लोकांची घरे होती.  त्यामुळे हा परिसर खास आपल्यासाठी होता ! आम्ही आल्याबरोबर सकाळी आसपासची सर्व मंडळी हजर झाली. कोणी चहाची, तर कोणी नाश्त्याची व्यवस्था केली. नंतर जेवणाची व्यवस्थाही झाली. घरातील सामान लावायला चार हात पुढे आले, त्यामुळे दोन छोट्या मुलांबरोबर सामान लावण्याच्या माझ्या कसरतीला मदत झाली. लवकरच आम्ही तिथे रुळून गेलो.

एक दीड वर्षाचा कालावधी, पण मला खानदेशी जीवनाचा त्यानिमित्ताने झालेला परिचय यात लिहावासा वाटतोय! आम्ही तिथे गेलो तेव्हा प्रथम जानेवारीची थंडी होती. सकाळी खूप गारठा असे आणि नंतर दिवसभर ऊन तापत असे. इतक्या गरम आणि विषम हवामानाची आम्हाला सवय नव्हती, पण थोड्याच दिवसात तेथील रुटीन चालू झाले. सगळेजण मला आणि ह्यांना ताई, दादा म्हणत असत. बोलणे गोड आणि वागणूकही मान, आदर दाखवणारी!

रोज सकाळी लिंबोणी खालचा कचरा काढायला शिपाई आला की त्याच्या झाडूच्या आवाजाने जाग येई. अंगणात सडा मारून रांगोळी काढणे इतकेच काम असे ! नंतर येणारी लता, भिल्ल समाजाची होती. सतरा-अठरा वर्षांची ती मुलगी स्वभावाने गोड आणि कामसू  होती.  ताई,ताई करून ती घराचा आणि मुलीचा ताबा घेत असे. केरवारा, भांडी करता करता मला सगळ्या गावाची माहिती देत असे.

माझी छोटी मुलगी जेमतेम तीन महिन्याची होती, त्यामुळे तिला आंघोळ घालण्यासाठी  लताची आई येत असे. गॅस नसल्यामुळे एका वातीच्या  आणि पंपाच्या स्टोव्हवरच स्वयंपाक करावा लागत असे. दवाखान्यातील एक शिपाई  भाजीपाला किंवा इतर सामान आणून देत असे, तर दुसरा एक  शिक्षित होता, तो माझ्यासाठी लायब्ररीची पुस्तके बदलून आणत असे. असं राजेशाही आयुष्य चालू होतं आमचं !

त्यावेळी संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी लाईट जाणं हे नेहमीच असे. लहान मुलांना त्याचा खूपच त्रास होई. उकाडा खूप ! लाईट नाही,पंखा नाही, त्यामुळे तिकडच्या लोकांप्रमाणे आम्ही विणलेली बाज खरेदी केली होती. ती अंगणात टाकून त्यावर संध्याकाळी गप्पा मारत बसायचे. तिथल्या बायकांना आपल्याकडील पदार्थ, राहणीमान याविषयी मी सांगत असे, तर त्यांच्याकडून तिकडचे पदार्थ शिकत असे. दादरचे पापड, मूग, मठाचे(मटकीचे) सांडगे तोडणे, कलिंगड, खरबुजाच्या बिया भाजून खाणे अशा बऱ्याच गोष्टी मला तिथे कळल्या ! बऱ्याच घरातून संध्याकाळी फक्त खिचडी बनवली जाई. त्या सर्वांना आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांसाठी मी रोज संध्याकाळी पण पोळ्या, भाकरी करते याचे आश्चर्य वाटे ! दवाखान्यातल्या सिस्टर खूप चांगल्या होत्या. उन्हाळी पदार्थ करताना त्या मला मुद्दाम बोलवत, आणि गव्हाचा शिजवलेला चीक  खाऊ घालत!

सगळीच माणसे सरळ आणि प्रेमळ मनाची होती.

तो दवाखाना विशेष करून बाळंतिणीचा होता. त्यामुळे रोज जवळपास एक दोन तरी डिलिव्हरी असायच्याच ! खाण्यापिण्याची सुबत्ता असल्याने एकंदर तब्येती छानच असायच्या ! एकदा तर एका बाईचं अकरा पौड वजनाचे बाळ डिलिव्हरी झाल्याझाल्या दुपट्यात गुंडाळून आणून सिस्टरनी  मला दाखवले.ते पाहून मीच आश्चर्यचकित झाले !

खाण्यापिण्याच्या बाबतीत शिरपूर एकदम छान होते. छान दूध, तूप, खव्याचे पदार्थ मिळायचे. कलिंगडं, खरबूज यासारखी फळफळावळ मुबलक प्रमाणात असायची. शिरपूरच्या जवळून तापी नदी वाहते. त्यामुळे सर्व भाग सुपीक होता. शिरपूर जवळ ‘ प्रकाशे’ नावाचे तीर्थक्षेत्र आहे. तिथे तापी आणि गोमती नद्यांचा संगम  आहे.’ प्रती काशी ‘ म्हणतात त्या तीर्थक्षेत्राला !

गव्हाची  शेती खूपच असल्याने उत्तम प्रतीचा गहू मिळत असे. शिरपूर मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन्ही राज्यांना जवळ असल्याने तिथल्या भाषेवर हिंदी आणि गुजराथी भाषांचा प्रभाव दिसून येई. आणि अहिराणी भाषा ही तेथील आदिवासींची खास बोली ! ती आम्हाला फारच थोडी समजत असे. शैक्षणिक दृष्ट्या हा भाग थोडा मागास असला तरी काळाबरोबर हळूहळू सुधारणा  होत आहेत. येथील सर्वांना सिनेमाचे वेड भारी होते. गावात तीन सिनेमा टाॅकीज होती.  दर आठवड्याला पिक्चर बदलत असे. आम्हाला सिनेमाची फारशी आवड नव्हती आणि आमची मुले लहान म्हणून आम्ही कधीच सिनेमाला जात नसू. पूर्ण वर्षभरात सिनेमा न बघणारे आम्हीच ! माझी कामवाली सखी- लता, प्रत्येक पिक्चर बघून  यायची आणि मला स्टोरी सांगत काम करायची !तीच माझी करमणूक होती. शिरपूर लांब असल्यामुळे नातेवाईक ही फारसे येऊ शकत नसत. पण शिरपूरचा  तो काळ खूप आनंदात गेला तो तिथल्या लोकांमुळे! शिरपूरची खास तुरीची डाळ आणि तांदूळ घालून केलेली खिचडी आणि कढी विसरणार नाही. दादरचे पापड,सांडग्यांचे कालवण,डाल बाटी, तऱ्हेतऱ्हेची लोणची ,खास खव्याचे मोठे मोठे पेढे आणि आमरस-पुरणपोळी हे पक्वान्न अजून आठवते ! तिथले तीनही ऋतू अनुभवले ! उन्हाळा, हिवाळा पुन्हा पावसाळा ! आणि पुन्हा आपल्या गावाकडे परतलो. पण अजूनही शिरपूरचा खास पाहुणचार आम्ही विसरलो नाही. बहिणाबाईंच्या लोकगीतातून  दिसणारे खास खान्देशी समाज जीवन, तेथील प्रेमळ आदरातिथ्य आणि  तेथील मातीची ओढ हे सगळं दृश्यरूप होऊन डोळ्यासमोर आले ! इतक्या वर्षांनंतरही शिरपूरचे ते थोड्या काळाचे वास्तव्य मनाच्या कोपऱ्यात तिथल्या साजूक, रवाळ तुपासारखे स्निग्धता राखून ठेवलं आहे !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कालनिर्णय ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

? मनमंजुषेतून ?

☆ कालनिर्णय ☆ सौ राधिका भांडारकर ☆

—बारा पाने..

वर्ष संपलं. काळाचं एक पाऊल पुढे गेलं. ३१ डिसेंबर २०२१—शेवटचा दिवस. काळाच्या फडफडणार्‍या पानांबरोबर भिंतीवरचं कॅलेंडरही फडफडलं !!

खरं म्हणजे “भिंतीवरी कालनिर्णय असावे….!!”

या माध्यमातील काव्यपंक्तीनेच आपलं नव वर्षं सुरु होतं…….

” कालनिर्णय ” हा घरातला पाहुणा नव्हे, तर तो आपल्या परिवाराचा महत्वाचा घटक आहे !!

वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा सहभाग असतो.

सुट्ट्या ,सोहळे, व्रते, उपवास, प्रवास, जयंत्या, पुण्यतिथ्या, वैयक्तिक टिपणे —-.

अशा अनेक बाबींची स्मरण यादी म्हणजे कालनिर्णय— वर्षभर तो दिनविशेष सांगतो. शुभअशुभाचे ‘ सावधान ’ इशारेही देतो. “माझा नाही बुवा विश्वास..”” असं म्हणत, कालनिर्णयमधील राशीभविष्य गंमत म्हणून का होईना वाचलं जातंच. पाककृतीसाठी विविध माध्यमे उपलब्ध असली तरीही कालनिर्णयच्या महिन्यामागचं पान वाचणं हा गृहिणींचा आनंदच…!! 

संपूर्ण साहित्यमित्र— ३६५ व्या दिवशी या मित्राचा सहवास संपतो….

भिंतीवरच्या खिळ्यातून कालनिर्णय काढलं, नव्या कोर्‍या ,नववर्षाच्या कालनिर्णयाची घट्ट गुंडाळी उलगडली आणि त्याच जागी ही नवी दिनदर्शिका लावली—-

जुनं काढतांना मनात आलं, “या वर्षानं खूप सतावलं—शिकवणही दिली….नवं लावताना मनांत आशा पालवली—’ सारी इडा पीडा जुन्याबरोबर जाऊदे…’

हातातल्या जुन्याची पानं फडफडली.. क्षणांत अनेक चौकोनात केलेले शाईचे गोल दिसले. स्वअक्षरांतील टिपणे दिसली. खरं म्हणजे सारं काही होऊन गेलेलं होतं !! आता होती ती रद्दी !!   —उगीच भास झाला—-चुरगळलेली पानं म्हणत होती—” गरज सरो वैद्य मरो..!! हेच ना शेवटी—

वर्षभर तुझ्या पावलांबरोबर चाललो—साधं धन्यवादही नाही? कचर्‍याच्या टोपलीतला पुढचा गलिच्छ प्रवास सुरू होण्यापूर्वी थोडं मनांतल.!– वाईट नक्की कसलं वाटतंय् ? या घरातलं वास्तव्य संपल्याचं, की खड्यासारखं दूर भिरकावून दिल्याचं…? “

पण शेवटचं पान धीर गंभीर होतं. अधिक परिपक्व ,गंभीर ,विचारी —-त्यानं दिलासा दिला—- 

“ आग!मी कालनिर्णय आहे. कालाचे निर्णय ठरलेलेच असतात. कुठलीही स्थिती स्थिर नसते.जुनं जातं—

नवं त्या जागेवर येतं..झाडावरची पानं नाही का गळत? तेव्हांच नवी पालवी फुटते. अन् जीवन 

पुन्हा बहरतं !! नव्या आशा – नवी उमेद – जुन्याला निरोप ,नव्याचे स्वागत..!!

तुझी भिंत सोडून जाताना मीही उदास आहेच ! All partings in life are sad indeed—

पण मी तुझ्या स्मृतीत असेनच—निरोपाचा हात हलवताना इतकंच म्हणेन,” नव वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !! 

“ शुभास्ते पंथान:….!!!  धन्यवाद “कालनिर्णय २०२१ ” !!

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ -पदर- ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे

सुश्री उषा जनार्दन ढगे

? मनमंजुषेतून ?

☆ पदर ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆ 

रविवार होता त्या दिवशी, मी प्रथमच पाहिले होते त्यांना..

त्या घरात प्रवेश करीत होत्या..आबांसोबत विवेक व विलासदादांसोबत..

पहायला आल्या होत्या त्या आमच्या बिंबाला–अदबीनं सावरत होत्या त्या– 

डोईवरला तो आपला पदर..!

 

मग पसंती..शकुनाची देणी-घेणी..वाडःनिश्चय-विवाहाची बोलणी

संबंधित नातेवाईकांची यादी– मी पाहिलं डोळ्यांच्या कडेनं,

जराशा झटक्यानंच लगबगीनं ओढून घेतला होता—

माईंनी तेव्हाही आपला पदर..!

 

नंतर आमंत्रणं..लगीनघाई–मिरवल्या होत्या मनसोक्त

थोरल्या लेकाच्या लग्नात..ठसक्यात,सासूबाईंच्या तोर्‍यात..

आठवणीत राहिला झळाळणारा—

तो रुंद काठाचा जरतारी पदर..!

 

ढग्यांची बिंबा आता राधिका झाली–

राधिका राधिका म्हणून माईंच्या सावलीत वावरू लागली..

मग सासूरवाशीणीला जवळचा,आधाराचा वाटला होता तो

माईंचाच…मायेचा पदर..!

 

अमळनेरच्या भल्या मोठ्या घरात–घर कसलं हो–चिरेबंदी वाडाच तो..

माणसांचा रगाडा..होता दबदबा–होते नोकर-चाकर फार–कधी शेतकामाचा भार

कामे वाटून सांगतांना..सूचना-सल्ले देतांना–खोचलेला असायचा

कमरेला तो माईंचा पदर..!

 

मग कधी समारंभ–पूजा-अर्चा..लग्न सोहळे–प्रसंगोत्तर माई भेटत..

दरवेळी वयाची बेरीज होतांना दिसलेल्या–काहीशा पाठीत झुकत चाललेल्या..

पण माईंच्या डोक्यावर डौलात दिसायचा मात्र..

तो सोनेरी भरजरी पदर..!

 

माईंच्या घट्ट बांध्याला, मोहक हसर्‍या गौरवर्णी रुपाला..

खानदानी घरंदाज व्यक्तिमत्वात भर घालणारा साजेसाच होता,

नेहमीच त्यांच्या डोईवरला तो पदर..!

 

लेका-बाळांच्या,सुना-नातवंडांच्या अखंड स्मरणात राहील

तो हरवलेला……तरीही ममतेचा वात्सल्याचा जिव्हाळ्याचा

माईंचा तोच मायेचा ऊबदार पदर..!!!

 

© सुश्री उषा जनार्दन ढगे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी सेवानिवृत्ती की साठीशांत- भाग- दुसरा … बीना ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ माझी सेवानिवृत्ती की साठीशांत भाग दुसरा… बीना ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

(‘तुझा तुझ्या मातृभाषेतलाही शब्दसंग्रह कमी आहे म्हणून तुला राग व्यक्त करायला शिव्यांच्या कुबड्या घ्याव्या लागतात’.) — इथून पुढे —– 

वस्तू जागच्या जागी हव्यात, अंधारातही हात घातला तर ती वस्तू तिथेच सापडली पाहिजे ‘ हे  बरोबरच आहे. पण कधी कधी पसाराही हवासा वाटायला लागला आहे. नाही, खरंतर कधीतरी आळस करणंही ठीक आहे हे पटायला लागलंय. 

ज्यांच्यावर जिवापलीकडे प्रेम केलं, आपल्या गरजा बाजूला ठेऊन, स्वतः पलिकडे जाऊन ज्यांच्यासाठी केलं ती माणसं आपली आठवणही काढत नाहीत हे बघून पूर्वी त्रास व्हायचा. नंतर नंतर बाबांच्या ‘ करावं आणि रस्त्यावर ठेवावं. नाही तर घेणाऱ्याच्या डोळ्यातली लाचारी आपला अहंकार फुलवते ‘ या वाक्याचा अर्थ कळला. खरंच आपण आदर, सन्मानाच्या आधीन होत जातो, demanding होत जातो. मग तो नाही मिळाला की त्रास होतो. आता सत्पात्री दानाबरोबरच गुप्त दानाचा अर्थ आणि त्यातला निरपेक्ष आनंदही कळलाय. कारण मदत आपण दिलीये हे नकळता मदत मिळाल्याचा आनंद व्यक्त करणाऱ्या डोळ्यात आपली मदत घ्यावी लागल्याची लाचारी दिसत नाही. 

मी सहसा कुठल्याही भौतिक सुखात अडकणारी नाही. सकाळीच काय कित्येक दिवस चहा कॉफी नाही मिळाली तरी माझं डोकं दुखत नाही. हौसेनी जमवलेल्या क्रोकरी सेटमधलं काही फुटलं तरी समोरच्याला लागलं नाही न हे मला कायमच महत्त्वाचं वाटत आलेलं आहे. असं कितीतरी. 

पण तीन मोह मात्र अजून सुटता सुटत नाहियेत. भाजी, क्रोकरी आणि पुस्तकं हे माझे weak points. कपड़े, दागिन्यांच्या दुकानात न्या, सहसा फरक नाही पडत. पण साठी झाली तरीही एकटी असून भाजीचा, घरात जागा नसूनही क्रोकरीचा आणि हातात मोबाईल असला तरी पुस्तकांचा नाद काही सुटता सुटत नाहिये. तो तेवढा कसा सोडवावा हे कळत नाहीये, खरं तर सोडावासा वाटत नाहीये. कारण तो निरुपद्रवी आहे. असो. ते एक माझ्या माणूस असण्याचं, जिवंतपणाचं लक्षणच समजू या. थोडक्यात स्वतः पलिकडे जाऊन दुसऱ्याला प्लीज करण्याच्या अट्टाहासातला फोलपणा लक्षात आला आहे. 

वादातला निरर्थकपणा लक्षात आलाय. कलेतल्या स्वानंदधनाचा ठेवा सापडलाय. त्यामुळे लोकं ज्या वयात हातातून सगळं निसटतंय म्हणून खंतावतात, त्या वयात मी आनंदी आहे. 

हे सगळं अंगी बाणताना त्रास झाला, हो झालाच. पण आज मागे वळून बघताना समाधान वाटतंय. कारण त्यानी मला जसं निर्माण केलंय त्या माझ्या अस्तित्वाशी मी प्रामाणिक आहे.  एवढंच नव्हे तर तर वेळोवेळी त्यात चांगल्या गोष्टींची भर घालत स्वतःला समृध्द करत जगतेय. उठसूट त्याच्याकडे मागण्या, तक्रारी घेऊन जात नाही. पण त्याला ‘Thank you’ म्हणायला मात्र कधीच विसरत नाही. 

आता निवृत्ती घेतेय म्हणजे सगळ्यातून संन्यास घेणार का? तर तसं मुळीच नाहीये. उलट काही बंधनं शिथिल करून मजेत आयुष्य जगणार आहे . गेली कित्येक वर्षं बंद केलेलं socialization परत सुरू केलंच आहे, ते वाढवणार आहे . ( पण कोणाच्याही दबावाखाली येऊन स्वतः पलिकडे जाऊन मदत करणार नाही ). मग टपरीवर वडापाव खाणं असो की five star मधे जाणं असो, की आप्त इष्ट जमवून, गप्पा छाटत, midnight snacks, चहा कॉफी घेत रात्रभर धमाल करणं असो.

कोणी सांगितलं. याच्याशी बोलू नको, अमुक करू नको, तर म्हणेन, तू सांगितलंस म्हणून बोलीन किंवा नाही बोलणार; करीन किंवा नाही करणार असं काहीही होणार नाहीये. कारण दोन्ही प्रकारात मी कुठे असेन? तुलाच किंमत दिल्यासारखं होईल. मला वाटेल तिथपर्यंत बोलीन, करीन, मला वाटलं की थांबीन.

तसंच, कोणाचा गैरसमज झालाय असं दिसलं तर २-३ वेळा स्वतःहून बोलायचा प्रयत्न करीन. त्यानंतर ‘Leave it, Forget it’.  मी कोणाला emotional blackmail केलं नाही, आणि आता मीही होणार नाही. अपना फंडा तो भई ‘ Live, and Let Live ‘. ‘ Enjoy and let Enjoy ‘ वाला है —–

समाप्त.

लेखिका – बीना 

संग्राहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी सेवानिवृत्ती की साठीशांत – भाग-पहिला… बीना ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ माझी सेवानिवृत्ती की साठीशांत भाग पहिला… बीना ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

नोकरी नसणारी मी कशातून निवृत्ती घेणार आहे असा प्रश्न पडला नं ! पण तुम्हीच विचार करा, नोकरी व्यतिरिक्तही आपण नात्यातील, समाजातील कितीतरी जणांची वैचारिक ताबेदारी करत असतो. 

‘My Life, My Rules’ हा फंडा उशिरा कळला. आणि साठी पूर्ण होतेय, तेंव्हा निवृत्तीचे विचार घोळायला लागले. कशा कशातून निवृत्ती बरं?—-

सगळ्यात पहिली निवृत्ती वैचारिक ताबेदारीतून. विचार मांडणारा कितीही महान असला तरीही त्याचा विचार मनाला रुचला, प्रकृतीला पचला, प्रवृत्तीला झेपला तर आणि तरच स्वीकारायचा. अन्यथा ‘Sorry Boss’ 

आपल्या आजूबाजूचे लोक, मीडिया ‘ह्या वयात अमुक खा, त्या वयात तमुक होतं’, असं सांगायला लागले, की मी माझ्या मनाला ‘Cancel, Cancel, Cancel’– ‘इदम् न मम’- ‘हे माझं नाही, माझ्यासाठी नाही’ असा संदेश ठळकपणे पाठवत रहाते. कितीतरी ८०-९० वर्षाची माणसं fit n fine असतातच की. मी त्यांच्याकडे बघते. 

बरेच जण आपला हेतू साध्य करण्यासाठी खोटी कारणं दाखवून emotional blackmail करतात. आता अशी माणसं ओळखू येऊ लागली आहेत. त्यांच्यापासून जरा लांब. दुसऱ्यासाठी निर्णय घेऊन स्वतःवर कलंक घेणं बंद. 

आपल्या कपड्यांवरून, sophisticated वागणुकीवरून कोणी जज करू लागलं तर समजावण्यात वेळ घालवत बसायचं नाही आणि आपले कपडे, वागणंही बदलायचंं नाही. ठसठशीत कुंकू आणि ५-१० तोळ्याचं मंगळसूत्र घालणारी बाई पतिव्रता असतेच असं नाही, हे कळण्याएवढा अनुभव आता नक्कीच गाठीशी आहे. 

पुर्वी कोणी नमस्कार केला तर सांगत असे, ‘ निव्वळ वयानी मोठी आहे म्हणुन वाकू नकोस, ज्या दिवशी ‘ नमस्कारासाठी मी योग्य आहे ‘ असं मनापासून पटेल त्या दिवशीच वाक ‘. कारण त्यातला फोलपणा आणि कधी कधी असलेला दांभिकपणा समजायला लागला होता. पण आता कोणी कशाही भावनेनी वाकलं तरी मनापासून शुभाशीर्वाद देते. वाकणाऱ्याची भावना काही का असेना, माझा ताबा माझ्या भावनेवर. ती स्वच्छ असली म्हणजे झालं.

लोकं नाही नाही ते आरोप करतात, मागे बोलतात, समोर येऊन विचारत नाहीत. अशावेळी पूर्वी स्वतः जाऊन स्पष्टीकरण देत असे. पण ‘ तुमचा खरेपणा अगर चांगुलपणा सिद्ध होण्यापेक्षाही लोकांचं स्वतःच्या मतावर जास्त प्रेम असतं. ते चुकीचं ठरणं त्यांना परवडणारं नसतं ‘, हे कळल्यावर, ‘ Don’t give explanation. Your friends don’t need it and others don’t believe it ‘ हे स्वानुभवाने तंतोतंत पटलं. 

मला गॉसिप कधीच करता आलं नाही. मागे जर काही बोललेच तर ते त्या त्या माणसाच्या समोर बोलू शकेन असंच असतं. त्यामुळे कोणी मला निरस समजतात, ‘ गॉसिप नाही तर काही मजा नाही. तू रिस्क घेत नाहीस ‘, असं म्हणतात. पूर्वी असं ऐकलं की चिडचिड व्हायची, वाईट वाटायचं. पण लवकरच त्यातली मजा कळायला लागली. कोणी चुकून जरी माझ्या नावावर काही बिलं फाडायचा प्रयत्न केला तरी त्याचा तोच तोंडघशी पडतो. 

पूर्वी गैरसमज पोसत बसलेल्या माणसाशी वाद घालायची, कधी त्या माणसाकडेच पाठ फिरवत असे, ग्रुपमधे असले तर ग्रुप सोडून देत असे. नंतर आपला राग थोडा शांत झाल्यावर सारासार विचार करून त्या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करत असे. आता माझं मत मांडते आणि बाजूला होते. कोणी समजून घ्यायला, चर्चा करायला आलं तर बोलते. मात्र कोणी गैरसमज करून घेतले, ओढवून घेतलं, तर चक्क ‘Carry on’ चा green signal देते. 

‘ मला एक से एक शिव्या येतात ‘ हे गर्वानी बोलणारे पुरुषच नव्हे तर स्त्रियाही बघितल्या, तेव्हा 

‘ तू पुस्तकी बोलतेस ‘ ह्या हिणवणाऱ्या वाक्याचं वैषम्य वाटणं बंद झालं. आता ठासून सांगते,

 ‘ तुझा तुझ्या मातृभाषेतलाही शब्दसंग्रह कमी आहे म्हणून तुला राग व्यक्त करायला शिव्यांच्या    कुबड्या घ्याव्या लागतात ‘. 

क्रमशः,,,,

लेखिका – बीना 

संग्राहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कांदा….शिरीष लाटकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? मनमंजुषेतून ?

कांदा….शिरीष लाटकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

“ मित्रा .. जरा कांदा घेतोस .. ?”

आमच्या शेजारच्या टेबलवर बसलेल्या माणसाने आवाज दिला ..

तसा वेटर विनम्रपणे त्याच्याजवळ आला …” सर … चॉप करून देऊ की पिसेस मध्ये … ?”

तसा तो बेफिकीर स्वरात म्हणाला …” आण कसा ही ….” 

आणि पुढच्याच क्षणी माझी मान गर्र्कन वळली ..चेहऱ्यावर कमालीची नापसंती … कपाळावर ठळक आठी …

समोर बसलेल्या दीपाने माझा नूर अचूक ओळखला …हातावर हात ठेवत म्हणाली …” असू देत … जेव शांतपणे …सगळ्यांचे तुझ्यासारखे नखरे नसतात …”

आता मी तिच्याकडे रोखून पाहिलं .. तशी ती गालात हसली …स्त्री धर्माला अनुसरून तिने टोमणा मारायची अचूक संधी साधली होती ..

मी दबक्या पण ठाम आवाजात म्हणालो …“ नखरे नाही .. ह्याला रसिकता असं म्हणतात …” 

दीपाने नुसतीच मान हलवली … पटलं होतं की नाही .. कुणास ठाऊक .. ?

अर्थात तिच्यासाठी हे नेहमीचं होतं म्हणा …खाण्यापिण्याच्या बाबतीतला माझा चोखंदळपणा तिला पुरेपूर माहितीय ..उगाचच ‘जाणिजे यज्ञकर्म’ म्हणून खाणाऱ्यांमधला मी नाही … उलट ‘आधी रसने भुलविले – मग उदर शमविले’ (हा माझाच श्लोक आहे .. वेदपुराणात शोधू नये) या कॅटेगिरीमधला मी आहे …  ‘ खाण्याच्या बाबतीत चवीशी तडजोड होऊ शकत नाही …’ असं माझं ‘भीष्ममत’ आहे ..

आणि कांदा हा चव वाढवणाऱ्या समस्त गोष्टींमध्ये अग्रस्थानी आहे … यात शंका नाही .. कांदा हा जगातला असा एकमेव पदार्थ आहे .. जो कसा चिरलाय, यावरून तो कशाबरोबर खायचा हे ठरतं.

नाही कळलं … ? एक मिनिट … समजावून सांगतो …

एकच कांदा वेगवेगळ्या पद्धतीने चिरला की त्याची चव वेगवेगळी लागते ..

म्हणजे बघा .. पावभाजी सोबतच कांदा …हा साधारण पाव सेंटीमीटरच्या आकारात एकसारखा चिरलेला हवा ..कांदा असा चिरला की त्याला हलकासा रस सुटतो …. हा रस भाजीच्या तिखटपणाला अचूक छेद देत तिची गंमत वाढवतो …  

मिसळीचा कांदा .. तो ही खरंतर बारीक चिरलेला …. पण त्यात वरच्यासारखी एकसंधता असता कामा नये ..काही तुकडे लहान हवेत … काही किंचित मोठे हवेत .. !मिसळीत असूनही कांद्याने आपली आयडेंटिटी टिकवली पाहिजे … तर मजा आहे …. तर्रीत तरंगणारी मिसळ खाताना कांद्याचा एखादा किंचित मोठा तुकडा दाताखाली येतो तेव्हा जी अनुभूती येते ती निव्वळ अवर्णनीय.

बऱ्याचदा जेवणात आपण गोल चकत्या केलेला कांदा घेतो …दातांना चाळा आणि जिभेला ब्रेक म्हणून ठीक आहे …पण माझ्या दृष्टीने त्याची फार मोठी ओळख नाही ..म्हणजे भारताच्या राजकारणात अण्णा हजारेंच्या उपोषणाला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व या कांद्याला जेवणात असतं .,.

त्यापेक्षा मद्यपान करत असताना सॅलडमध्ये असलेला हाच गोल चकतीचा कांदा जास्त रंगत आणतो …. मद्याची कडवट चव जिभेवर असताना हा कांदा जिभेवर चुरचुरला की पिण्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं …

ताटात वाढली जाणारी कांद्याची अजून एक पद्धत म्हणजे ‘कंटाळकांदा’…. जेवणाची ताटं वाढलेली असताना नवऱ्याने ऐनवेळी कांदा मागितला की बायको रागाने कांद्यावर वार करून त्याच्या चार फोडी करते आणि वाढते .. त्याला ‘कंटाळकांदा’ असं म्हणतात …हा प्रकार आपल्याकडे विशेष लोकप्रिय आहे … कारण तो सोपा आहे ..पण मला तो केविलवाणा वाटतो …एखादा नको असलेला मुलगा आपल्या ग्रुपमध्ये शिरला की कसं फिलिंग येतं .. अगदी तसं फिलिंग हा कांदा देतो … अशा प्रकारे चार तुकडे करून कांदा देणारी हॉटेल्सही मला फार रुचत नाहीत …कारण त्यात प्रेमाने खाऊ घालण्यापेक्षा कर्तव्य उरकल्याची भावनाच जास्त असते ..

ताटातलं खाद्य बदलेल … तसं कांद्याचं रूप बदलून वाढतो .. तो खरा …. म्हणजे कधी कधी तुम्ही तंदूर ऑर्डर करता आणि त्या सोबत एक विलक्षण इंटरेस्टिंग कांदा येतो …. हा कांदा पाकळी पाकळी वेगळी करून सर्व्ह केला जातॊ ….. तंदूरमधल्या बटाट्यापासून .. पनीरपर्यंत आणि चिकनपासून शीख कबाबपर्यंत प्रत्येकाशी याची सलगी असते … अर्धवट खरपूस भाजलेला .. तंदूरच्या मसाल्यात चिंब झालेला आणि आपल्या सोबत्याला (पनीर / चिकन) घट्ट बिलगलेला पाकळीचा कांदा म्हणजे स्वर्गसुख … ! तो टाळून इतर कुठलाही कांदा तंदूरसोबत खाणारे खाद्यनगरीचे गुन्हेगार आहेत .. असं माझं स्पष्ट मत आहे …

अर्थात तंदूरबरोबरचा हा कांदा बटर चिकनबरोबर अजिबात शोभत नाही …किंबहुना कुठल्याच पंजाबी डिशसोबत शोभत नाही …तिथे व्हिनेगर मध्ये बुडवलेला हलकासा लालसर झालेला आंबटसर अख्खा कांदाच हवा …घी मध्ये शब्दशः न्हायलेली बटर चिकनची डिश .. गरम गरम नानच्या तुकड्यासोबत तिचा घास घ्यायचा आणि मग एकच चावा घेऊन अर्धा कांदा फस्त करायचा …

देवा … सुखाची परमोच्च कल्पना … त्या क्षणी देवाने उचललं तरी मोक्ष मिळेल अशी स्थिती ..

हो पण … याच बटर चिकनची जागा जेव्हा कोल्हापुरी मटण घेतं .. तेव्हा कांद्याचं रूप ही निर्विवादपणे बदलतं … तिथे झणझणीत पांढऱ्या तांबड्याबरोबर गोड दह्यात सराबोर असलेला उभा चिरलेला कांदाच तोंडी लावायला हवा .. आणि कोल्हापूरचं मालवण झालं की हाच गोल चिरलेला कांदा लिंबाच्या रसात कुस्करून खोबऱ्याच्या हिरव्या चटणीबरोबर वाढला जायला हवा.  …

आणखी एक महत्वाचं …… 

जेव्हा चुलीवरची भाकरी … भरली वांगी आणि झुणका ताटात सजतो .. तेव्हा कांदा चिरण्या – कापण्याच्या आणि सोलण्याच्या फंदात पडूच नये … जमिनीवर ठेवावा नि हाताने उभा चेचावा ..

हो .. पण यातल्या बाहेरच्या पाकळ्या खायच्या नाहीत हां …मधली कोवळी पाकळी खायची फक्त ….. तुम्हाला सांगतो .. शहाळ्यातली मलई झक मारेल ..

एकूण काय … ‘ जैसा देस वैसा भेस ‘च्या धर्तीवर … जसं जेवण तसा कांदा !  

तेव्हा यापुढे हॉटेलात काय किंवा घरी काय– ‘आण कसाही ‘ म्हणायची चूक करू नका ..

चोखंदळ रहा … अहो … शास्त्र असतं ते … !

 

– शिरीष लाटकर

संग्राहक : – सुहास रघुनाथ पंडित 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गराज सेल—- ☆ डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ गराज सेल—- ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

दर वर्षी अमेरिकेचा दौरा होतोच. उन्हाळ्याच्या सुट्टीत नातीच्या शाळेला सुट्टी असली तरी मुलीला जावयाला ऑफिस असतेच. मग मी नातीला बघायला, तिची शाळा सुरू होईपर्यंत USA मुक्कामी असते.

ते दिवस मोठे सुंदर असतात.  उन्हाळा सुरू झालेला, पण उबदार उन्हाळा. झाडे नव्याने हळूहळू छान फुलून येतात.

एकदा फिरताना मुलीच्या कम्युनिटीमध्ये काही घरांसमोर निळे फुगे लावलेले दिसले. कुतूहलाने विचारले, ” हे कसले ग फुगे?” 

मुलगी म्हणाली, ” अग पुढच्या आठवड्यात गराज सेल आहे ना–त्याची खूण आहे, की लोकांना समजावे–इथे आहेत सेलच्या वस्तू.” 

मी हरखून गेले आणि म्हटले, ” अदिती मला  केव्हाचा बघायचाय ग हा सेल. खूप ऐकलंय याविषयी.” 

अदिती हसायलाच लागली. म्हणाली, ” आई, मागच्या खेपेला वृद्धाश्रम बघून झाला.  आता या वेळी गराज सेल ? ” 

” हो, अनायसे आलेच आहे, तर नेच मला. “

 ती कबूल झाली. छोट्या आद्याला जावयाने सांभाळायचे कबूल केले आणि त्या रविवारी आम्ही गराज सेल बघायला निघालो.

तिच्या कम्युनिटीत जवळजवळ आठशे बंगले आहेत. आम्ही कारने जिथे फुगे दिसतील तेथे थांबत होतो—प्रत्येक ठिकाणी किती व्यवस्थित सामान लावले होते–गडबड नाही, गोंधळ नाही. प्रत्येकाच्या गराजमध्ये आणि समोरही खूप जागा असते. तिथे नको असलेले सामान ठेवले होते. समोर खुर्ची टाकून मालक किंवा मालकीण बाई बसल्या होत्या. किती प्रकारचे सामान  हो।

मुलांची खेळणी-अगदी नवी चकचकीत असावी अशी, पुस्तके, क्रोकरी, काय नव्हते तिथे ?  अगदी  फ्रीज-टी.व्ही. सुद्धा बघितले. मला इतकी मजा वाटत होती.

हा सेल शनिवार-रविवार असतो. त्यासाठी आधी  कम्युनिटीची नाममात्र फी भरावी लागते, मगच ते विशिष्ठ फुगे देतात. दोन्ही दिवस ९ ते १ पर्यंत वेळ असते. १ वाजता सेल बंद होतो.

खूप लोक या सेलमधून  संसारोपयोगी वस्तू घेतात. कोणीही मोडके तोडके असे काहीही ठेवत नाही. आणि अगदी नाममात्र किमतीत हे मिळते. 

उद्देश फक्त एकच —आपल्या वस्तू  हलवणे,  ज्यांचा आता घरमालकाला उपयोग नसतो. मुले मोठी झाली की खेळणी पडून राहतात. मोठा tv घ्यायचा तर आधीचा कुठे ठेवणार? आपल्या इकडच्यासारखा exchange तिकडे नाही.

अशीच फिरताना मला माझ्या खूप आवडत्या, सिडने शेल्डनची कोरी पुस्तके दिसली. मोठे खोके भरून बाहेर ठेवली होती. केवढा आनंद झाला सांगू—लेक म्हणाली,” बाई ग ही सगळी घेणारेस की काय ? बॅगेचे वजन माहीत आहे ना ?”

मी सरळ खाली वाकून ती बघू लागले. किंमत फक्त 1 डॉलर लिहिली होती. मला इतका आनंद झाला. जवळ आरामखुर्चीवर एक खूप म्हाताऱ्या बाई विणत बसल्या होत्या.

मी त्यांना ‘ हलो ‘ म्हटले आणि विचारले,” बघू ना ही मी पुस्तके?”

त्या म्हणाल्या ,” बघ की. कुठून आलीस ? इंडियातून का ? ” मी ‘ हो ‘म्हटले. माझ्या खांद्याला लोकरीची विणलेली सुंदर स्लिंग बॅग होती–माझ्या आईने विणलेली.  त्यांनी ती बघितली आणि म्हणाल्या, ” मी ही बॅग बघू का ?”

मी म्हटले, ” हो,बघा ना. माझ्या आईने विणलीय. तिला खूप हौस आहे विणायची. तुमच्या एवढीच आहे ती आता. “

त्या हसल्या आणि म्हणाल्या, “ मी ८९ वर्षाची आहे. माझ्या मुलाचे हे घर आहे. तोही आता ६५ वर्षाचा आहे. कोण कोणाला सांभाळणार ? मी आपली  वृद्धाश्रमात राहते. इकडे अशीच पद्धत आहे. तेच बरेही पडते. चांगला आहे मी राहते तो वृद्धाश्रम. “ 

त्यांनी माझी स्लिंग बॅग नीट बघितली– “ छानच विणली आहे “ म्हणाल्या.

मी पटकन ती रिकामी केली. अदितीच्या purse मध्ये माझे सामान टाकले आणि त्यांना म्हणाले, “ घ्या ही तुम्हाला .नवीनच आहे हं. मी इकडे येणार म्हणून आईने नवीन विणून दिली.”  त्या खूप संकोचल्या..  ‘नको नको. मी सहजच म्हटले अगदी.’ असं म्हणत राहिल्या. 

“ पण तुम्हालाही आवडते ना विणायला, म्हणून देतेय,”

त्या खुश झाल्या.  म्हणाल्या “ थँक्स डिअर. आता मी अगदी अशाच विणून माझ्या वृद्धाश्रमातल्या मैत्रिणींना देईन.: मला सांग, तू  इकडे का आली आहेस ? “

“ ही माझी मुलगी. तिला छोटी मुलगी आहे ४ वर्षाची. तिला सुट्टीमध्ये सांभाळायला  मी आलेय.” 

“  थांब हं जरा “ असं म्हणत त्या तुरुतुरु आत गेल्या आणि एक भलेमोठ्ठे  टेडी बेअर घेऊन आल्या. अदितीच्या हातात देऊन म्हणाल्या, “ नवीनच आहे हं हे. माझा नातू मोठा झाला त्याचे आहे. घे तुझ्या बेबीला. खेळेल ती याच्याशी. याचे नाव ब्लु बेरी आहे बरं का–माझ्या नातवाने ठेवलंय ते. “ 

आम्ही संकोचलो आणि म्हणालो, “ नको हो. उगीच कशाला ? “ 

पण त्यांनी ते परत घेतले नाही. उलट म्हणाल्या, ”तुझ्या आईला सांग, खूप छान विणतात त्या. मला एक गोड गिफ्ट मिळाली इंडियातून–थँक् यू सो मच–हे कसे म्हणतात तुमच्या भाषेत?” 

मी म्हटले,” आभारी आहे “ 

त्या म्हणाल्या, “ आईला सांग आभारी आहे “ 

आम्ही त्यांचा निरोप घेतला. अदितीने त्यांचा फोन नंबर घेतलाच होता. 

म्हणाल्या,” कधी जमले तर ये ग मला भेटायला आईला घेऊन माझ्या वृद्धाश्रमात. “ 

आम्ही घरी आलो. आद्याने  टेडी बघताक्षणीच कडेवर घेतले. त्याचे नाव विचारले.आणि त्या ब्लु बेरीशी जी काय दोस्ती तिने केली की विचारू नका. २४ तास ते तिच्या बरोबर।–अगदी 

झोपताना जेवतानासुद्धा. 

मी भारतात परत आले. एकदा फोनवर बोलताना अदिति म्हणाली, 

“ आई,त्या जेनी आजी गेल्या ग. मी त्यांना भेटायला गेले होते एकदा तेव्हा तुझी चौकशी करत होत्या. झोपेतच गेल्या म्हणे. त्यांच्या मुलाने कळवले मला. “ 

–मला वाईट वाटले. त्यानंतर जेव्हा केव्हा मी गराज सेल बघते, तेव्हा त्या गोड, निळे डोळे असलेल्या, पांढरेशुभ्र कापसासारखे  केस असलेल्या, बाहुलीसारख्या दिसणाऱ्या जेनी आजीची आठवण येते.

©  डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares