मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “वेळेचा वेळ…” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ “वेळेचा वेळ…” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

नेहमीच माझ्या पुढे पळणाऱ्या वेळेला एकदा खूप खूऽऽप खूऽऽऽप वेगात जाऊन गाठलेच कसेबसे •••आणि काय सांगू तुम्हाला••• अहो हा पकडलेला वेळ, माझ्या मुठीत राहील तर शपथ! मला त्याच्या बद्दल खूप कुतूहल••• खूप कौतुक••• त्याच्या विविध कला पाहून तर मी वेळेच्या प्रेमातच पडले•••पण त्याला निरखे पारखेपर्यंत निघूनच गेला•••

वेळच तो••• कोणीतरी स्वत:हून आपल्या मागे पडतोय म्हणल्यावर; त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा स्वभावच त्याचा••• मला कसलेही महत्व न देता, माझ्या मुठीतून सुटलाच लेकाचा•••

अरे देवा••• काय करू? कसे करू? मला तर वेळ पाहिजेच आहे••• अरे वेळा, •••किती वेळा तुझी आर्जव करू? •••मला फक्त माझ्यासाठी म्हणून तू हवा आहेस••• तू माझ्या जवळ असला तरी, घरच्यांसाठी••• ऑफिस साठी••• इतर कामासाठी••• मी तुझी विभागणी करते •••आणि मग शेवटी, माझ्यासाठी तू राहातच नाहीस••• माझ्यासाठीही तू रहावस म्हणून, मी खूप आटापिटा करते••• काहीही करून माझ्यासाठी तुझा वेळ घ्यायचाच म्हणते••• पण खूप धावपळ, दमछाक करूनही, माझ्यासाठी म्हणून तू गवसतच नाहीस•••

अरे, बघ जरा इतर प्रियकराकडे••• आपल्या प्रेयसीचा शब्द कसे झेलतात••• त्यांच्यासाठी काय काय करतात••• आणि तू •••? मी तुझ्या प्रेमात ईतकी व्याकूळ होऊनही तुझ्यापर्यंत माझे प्रेम कसे पोहोचत नाही? मागून मागून काय मागते तुझ्याकडे? फक्त तुझा थोडा वेळ ना •••पण अरे वेळा, तुझ्याकडे मला वेळ भेट द्यायला वेळच नाही••• तुझे हेच वैशिष्ट्य आहे ना••• ते मला आकर्षित करते तुझ्याकडे •••आणि मग मी तुझ्याच प्रेमात अधिकाधिक पडते•••

तू माझ्यासाठी रहावास, •••मी तुझ्याबरोबर वेळ घालवावा••• म्हणून माझी सगळी कामे अगदी भराभर उरकते••• माझ्याकडे असलेला वेळ अपुरा पडू नये म्हणून, घरात इतर कामासाठी बाई लावून, तो वेळही वाचवण्याचा प्रयत्न करते •••पण काय जादू करतोस तू? कळतच नाही••• एक काम संपवावे, तर दुसरे काम दत्त म्हणून हजर असते •••मग त्यासाठी नाईलाज म्हणून वेळ द्यावाच लागतो••• तरी ते काम उरकून, मग मी तुझ्या सोबत राहीन••• असे वाटून ते काम उरकते••• तर मुलांना काहीतरी खायची हुक्की येते••• त्यांचा गृहपाठ •••कोणीतरी पाहुणे येण्याचा फोन •••किंवा इतर काहीतरी••• मग ती वेळ, साजरी करण्यासाठी, त्या वेळेत त्या वेळे प्रमाणे नाचणे •••माझे माझ्या प्रियकराला, वेळेला भेटायचे राहूनच जाते••• मग काहीही झाले तरी उद्या आपण आपल्या वेळेला भेटू••• अशी स्वतःची समजूत घालून, स्वप्नातच वेळेला भेटून घेते •••पण तेथेही माझी मुले शिकून मोठी होतील••• चांगली साहेब होतील•••त्यांचे सगळे खूप छान छान चालले आहे••• मला कसलीच काळजी नाही •••असलीच स्वप्ने दाखवून माझ्यासाठी वेळ मला मिळतच नाही•••

काय मी करू? कसा तुझ्याशी संवाद साधू? मला माझे काही छंद जोपासायचे आहेत••• त्यासाठी तुझी मदत मला पाहिजे आहे •••काय म्हणतोस? मग तू इतरांकडे माग वेळ••• तुला काय वाटतं? मी हे केलं नसेल? पण अरे, आजकालच्या जगात, दुसऱ्यांना देण्यासाठी म्हणून कोणाकडेच वेळ नाही रे••• म्हणून तर तुझ्याच मागे लागायचे••• तुझीच आर्जव करायची•••

हल्ली मोबाईल रुपी यंत्र, मंत्र, का मित्र आला आहे ना •••त्यामुळे खरंच लोकांचा खूप वेळ वाचत आहे••• त्यांची बरीच धावपळ कमी झाली आहे••• पण••• मग काय? त्यातच असणाऱ्या गेम्स मध्ये, वेगवेगळ्या ॲप्स मध्ये, ते इतके गुरफटून जातात••• का स्वतःला गुरफटून घेतात••• माहीत नाही •••पण त्यांच्याकडे दुसऱ्यांना द्यायला वेळ नाही••• स्वतःला साठी असलेला वेळ, मस्त टाईमपास करण्यात घालवतात •••पण दुसऱ्यासाठी त्याचा उपयोग करावा असा विचारही मनात येत नाही••• अशी वेळ ••• ••• तूचतर त्यांच्यावर आणली नाहीस ना?

प्रियकरावर नि:संशयपणे प्रेम करावे••• असे असताना सुद्धा, माझ्या वेळेच्या प्रियकरावर मला संशय येऊ लागलाय••• पण••• विश्वासाने सगळे काही मिळते••• यावरही माझा विश्वास असल्याने, मला माझा असा वेळ मिळेलच••• अशी खात्री करून घेते••• आणि तुझ्यावर प्रेम करणे, अखंड चालूच ठेवते•••

पण पुढे असणारा वेळ मी पकडू शकत नाही••• मागे पडलेला वेळ मला सोडावाच लागतो••• आताच्या परिस्थितीतच तू मला पाहिजे आहेस••• माझी व्याकुळता जाणून घेनारे जरा••• मी एवढी काकुळतीला आली आहे म्हटल्यावर, तुला माझी दया आली •••काल खरच माझ्या स्वप्नात, माझ्यासाठी असलेला वेळ होऊन आलास••• मला भेटलास ••• मला म्हणालास, मी तुझे दुःख जाणले••• मग माझे पण दुःख तुला सांगावेसे वाटते••• ऐकशील?

अहाहा••• माझा प्रियकर••• माझ्यासाठी आला आहे••• मग त्याच्यावर प्रेम करायचे तर, त्याच्या ही व्यथा जाणून घ्यायलाच हव्यात ना? •••मग मी अगदी कान टवकारून, जीव एकाग्र करून, त्याचा हात माझ्या हातात घेऊन, म्हटले••• सांग ना••• मला आवडेल ऐकायला•••

तसा वेळ सांगू लागला ••• देवाने जसे तुला जन्माला घातले ना••• तसेच मलाही जन्माला घातले••• तुला बुद्धी तरी दिली आहे••• एक अभिव्यक्ती दिली आहे •••वेगवेगळे अवयव दिले आहेत••• पण माझे काय? जगातील इतके चराचर आहेत••• त्या सगळ्यां साठी चोवीस तास! ••••••• त्यात मला ना आकार••• ना मला काही करण्याचे स्वातंत्र्य••• कोणासाठी काय करायचे •••काय नाही •••हे मी ठरवत नाही •••तरी माझ्याकडूनच सगळ्या अपेक्षा ठेवून अक्षरश: जो-तो माझे लचके तोडत आहे ••• माझे असे लचके तोडणे आता सहन होत नाही••• म्हणून सगळ्यांच्याच पुढे मी धावत राहतो••• मला धावावे लागते••• कारण कोणाच्या हाताला लागलो, की लगेच लचका तोडला जातो •••काय करू मी तरी? जाऊ दे मला••• नाही तर अजून किती जण एकदम तुटून पडतील माझ्यावर •••काही सांगता येत नाही•••

हांऽऽऽऽ पण तुझे माझ्यावरचे प्रेम पाहून, मी खूप सुखावलो आहे••• म्हणूनच माझा वेळ तुझ्यासाठी देण्यासाठी, मी तुला एक कानमंत्र देतो••• बघ तू••• तुलाही वेळ मिळेल••• बघ •••आपल्या वेळेचे नाही, तर कामाचे विभाजन योग्य पद्धतीने कर••• आणि आपली कामे, पूर्ण जबाबदारीने करताना, ठामपणे इतरांनाही सांग••• मी माझी जबाबदारी, माझे कर्तव्य, पूर्ण केले आहे •••आता चोवीस तासांपैकी काही वेळ तरी, मी माझा म्हणून व्यतीत करणार आहे •••एक स्त्री असलीस तरी••• तो तुझा अधिकार आहे••• हक्क आहे••• आणि तो प्रत्येकाने मिळवला पाहिजे••• बघ तू मग••• तुझ्या हातात हात घालून, तू ठरवलेल्या वेळेत, हा वेळ फक्त तुला वेळ देईल•••

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हलकं फुलकं काही… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य)  ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ हलकं फुलकं काही… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

हलकं फुलकं काही….

निसर्ग आपल्याला मुक्त हस्ताने अनेक गोष्टी देत असतो…

शुद्ध हवा, पाणी, गारवा, फुलं, फळं आणि बरेच काही…..

देणं हा निसर्गाचा गुण आहे….

अनेक गुण अंगी यावेत म्हणून मनुष्य प्रयत्न करीत असतो….

देणाऱ्यांचा हात नेहमी वर असतो आणि घेणाऱ्याचा खाली…

आपला हात कायम वर रहावा असं वाटतं असेल तर आपण द्यायला सुरुवात केली पाहिजे…..

पटतंय ना?

आजचा दिवस आनंदाचा आहे…

© श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “गौरीताई…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “गौरीताई…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

माझी नातं पहिलीत असतानाची गोष्ट. शाळा सुटल्यावर संध्याकाळी रोज मी तिला बाल रंजन केंद्रावर घेऊन जातं असे.

तिथे मुलांचे छोटे छोटे वयानुसार गट केले जातं असतं. अठरा एकोणीस वर्षाच्या मुली… म्हणजे

“ताई” या मुलांना खेळ शिकवतं असतं. प्रार्थना, श्लोक, गाणी, गोष्टी, व्यायाम, ग्राउंड ला चक्कर असे तिथे चालतं असे.

त्या दिवशी गेले तर तिथल्या प्रमुख बाईंनी आमच्या ग्रुपला सांगितले की..

“नेहमीची ताई एक महिना रजेवर आहे. तर ही नवीन गौरीताई मुलांना महिनाभर शिकवणार आहे. “.

पाच फुटाची, सावळी, एकदम हडकुळी पण तरतरीत अशी मुलगी समोर आली. तिने आम्हा सर्वांना नमस्कार केला. मुलांना म्हणाली,

“बच्चे कंपनी चलो”

मुलं तिच्यामागे गेली. आम्ही पालक नेहमीप्रमाणे कट्यावर जाऊन बसलो.

एक आजोबा म्हणाले,

“ही एवढीशी तर पोरगी आहे… ही काय शिकवणार मुलांना? “

“हो न… हिला पाहिल्यावर माझ्याही हेच मनात आलं” दुसरे एकजण म्हणाले.

झालं… लगेचच तिच्या दिसण्यावरून अजून एक दोघांनीही कुठल्या कुठल्या कॉमेंट्स केल्या….

एक जण तर स्पष्ट म्हणाली,

” आपण मॅडमना सांगु ही मुलगी आमच्या ग्रुपला ताई म्हणून नको “…

“लगेच आजचं सांगायच”

” कोणीतरी म्हटलं चार दिवस जाऊ दे मग बघू…. नंतर सांगू”

तिला बघितल्याबरोबर अशी सगळी चर्चा झाली.

जरा वेळाने बघितलं तर आज राऊंड घेताना मुलं वेगळीच पळत होती. हसण्याचा आवाज ऐकू येत होता.

मुलं आज नेहमीपेक्षा जास्त आनंदात होती.

गौरीताई काहीतरी सांगत होती मुलं शांतपणे ऐकत होती. मधेच मुलांचा एकदमच ओरडण्याचा आवाज ऐकू आला…. नंतर मात्र मुलं फार हसत होती. आम्ही लांब बसलो होतो त्यामुळे काय चाललं आहे हे समजत नव्हते.

घरी निघताना मुलं गौरी ताईला अच्छा, टाटा, बाय-बाय करत होती. माझी नातं तर फार खुश होती. घरी जाताना रस्ताभर गौरीताईच कौतुक सुरू होत..

” गौरीताईंनी आज आम्हाला तुरुतुरु चालायला शिकवलं. इतकी मज्जा आली…. “

” तुरुतुरु ” हा शब्द तर तिला फारच आवडला होता.

” आजी गौरीताईंनी वाघाची गोष्ट सांगितली तिने वाघाचा आवाज काढला. आम्हाला तर भीतीच वाटली होती”

” म्हणून तुम्ही मगाशी ओरडत होता का”

” अग हो… ती म्हणाली मागे बघा खरंच वाघोबा आलेला आहे. आम्ही सगळ्यांनी मागे बघितलं तेव्हा ताई हसत होती. “

दुसरे दिवशी ग्राउंड वर जाताना नातं भलतीच उत्साहात होती. दरवाजातच माझा हात सोडून ती गौरीताई कडे पळाली.

गौरी मजा… मजा करत मुलांना शिकवत होती. आज दोन्ही हातांच्या मुठी हनुवटी खाली धरून तिने मुलांना पळायला सांगितले. मुले मस्त हसत होती…. गंमत करत होती… त्यांना हे वेगळं खेळणं आवडलं होतं. एकदा तिने मुलांना लुटुलुटू चालायला सांगितलं. खरंतर चालणं नेहमीच होतं पण लुटुलुटु शब्दाची मुलांना फार गंमत वाटत होती.

सगळ्यांना गोल उभ करून तिने हात पकडायला लावले. एक-दोन-तीन म्हटलं की सगळ्यांनी मध्यभागी जवळ यायचं चार-पाच सहा म्हटलं की लांब जायचं अशी खेळण्यात तिनी गंमत आणली होती.

गौरीला रोज नवीन काहीतरी सुचायचे. गोष्ट अगदी छोटीशीच असायची… पण त्यातल्या वेगळे पणाने मुलं त्यात रंगून जायची.. गुंगून जायची…

काही दिवसातच गौरीताई सगळ्यांची लाडकी झाली होती. बघता बघता महिना संपला. आज तिचा शेवटचा दिवस होता.

मुलांना वाईट वाटत होतं. ताई आता येणार नाही, परत भेटणार नाही म्हणून मुलांना खरोखरं रडू येत होतं.

तिचेही डोळे भरून आले होते. ती छोटीशी हडकुळी सावळी गौरी समोर होती…..

मुलं म्हणत होती,

” गौरीताई तुच आम्हाला शिकव ना “

“ताई किती छान आहे”

” ताई तु मला फार आवडतेस”

“ताई तु जाऊ नको ना”

ताई तुच आम्हाला हवी आहेस”

” ताई किती छान शिकवते”

मुलं अक्षरशः तिच्या ड्रेसला पकडून गोल उभी होती….

ती दोन्ही हातांनी मुलांना जवळ घेत होती. त्यांच्या पाठीवरून डोक्यावरून, गालावरून… हात फिरवत होती…

सगळ्या मुलांचा निरोप घेऊन ती निघाली…

तिचेही डोळे वहात होते…

ती लांबवर जाईपर्यंत मुलं हात हलवत उभी होती…

मी बघत होते…

माझ्या मनात विचार आला..

या मुलीकडे बघून आम्ही कधी असं म्हणू का? तिला पहिल्यांदा बघितल्यानंतर केलेल्या कॉमेंट्स मला आठवल्या.

या छोट्या मुलांना तिच्या रंग, रूपाचं, ऊंचीच काहीही देणघेणं नव्हतं…

ते तिच्या गुणाच्या प्रेमात पडले होते. तिच गुणगान करत होते… निखळं आणि निर्मळं मनाने… तिच्याकडे पाहत होते.

मुलं खरचं निरागस होती.. मनानी स्वच्छ होती..

त्या सात आठ वर्षाच्या मुलांकडे जे सात्विक निर्मळ मन होतं ते आमचा होतं का? तर खरचं नव्हते…

त्यांच वागणं बघुन मला आम्ही काय करायला हवे आहे हे समजले. त्यांच्याकडून काय शिकायला हवे हे पण समजले…

आम्ही अगदी वरवरचं बाह्यरूप बघतो आणि लगेच कोणालाही सहज प्रतिक्रिया देतो… ती ताना त्याला काय वाटेल किंवा तिला काय वाटेल याचा आम्ही कधी विचारही करत नाही.

” किती बारीक झाली आहे “

नाहीतर… ” किती जाड झाली आहे”

” केस किती गेले टक्कल पडायला लागले. “

“केस पांढरे झाले आहेत.. “

“डाय तरी करायचा “

“ही नीटच राहत नाही “

“कसले कपडे घातले आहेत”

” ईतक्यातच चष्मा लागला का? “

” पोट किती सुटलय… “

वगैरे वगैरे…..

तशी यादी खूपच मोठी आहे…

किती आणि काय लिहु… आणि तुम्हाला ती माहित आहे….

हे आठवले म्हणूनच आज आठवणींच्या पेटीतून गौरीताईला बाहेर काढलं…. त्या एक महिन्यात मी तिच्याकडूनही काही गोष्टी शिकले. म्हणूनच मी पण तिला गौरीताईच म्हणणार…

तिची गोष्ट तुम्हाला पण सांगावी म्हणून सांगितली…

नुसती गोष्टच तुम्हाला सांगायची होती का? ….

मला काय म्हणायचे आहे हे तुम्हाला आता कळलेलेच आहे…

तसे… तुम्ही सुज्ञ आहातच…. करा विचार…

सांगायला नकोच….

थांबते इथे….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ४ पैसे कमवणे म्हणजे काय ? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

⭐ मनमंजुषेतून ⭐

☆ ४ पैसे कमवणे म्हणजे काय – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

४ पैसे कमवणे म्हणजे काय ?

मुलाने काही कमावले तर ४ पैसे घरात येतील

किंवा

४ पैसा मिळवण्यासाठी माणूस रात्रंदिवस काम करतो.

मग या तथाकथित पैशांमध्ये केवळ ४ पैसे का ?

३ किंवा ५ पैसे का नाहीत हा प्रश्न आहे.. ?

चला तर मग वडिलधाऱ्यांकडून उपरोधिक तपशील जाणून घेऊन ‘ ४ पैसे कमवा ‘ ही म्हण समजून घेऊ या.

पहिला पैसा

विहिरीत टाकण्यासाठी.

दुसरा पैसा 

कर्ज फेडणे.

तिसरा पैसा 

पुढचे देणे भरणे

चौथा पैसा

भविष्यासाठी जमा करणे

या प्रकरणाची गुंतागुंत सविस्तरपणे समजून घेऊ या.

 

१. विहिरीत एक पैसा टाकणे.

म्हणजे

स्वतःच्या कुटुंबाची आणि मुलांची पोटे भरण्यासाठी वापरणे.

२. कर्ज फेडण्यासाठी दुसरा पैसा वापरा.

आई-वडिलांच्या सेवेसाठी.. ,

ते ऋण फेडण्यासाठी त्यांनी आमची काळजी घेतली, आमचे पालनपोषण केले आणि मोठे केले.

३. पुढील (मुलांचे) कर्ज फेडण्यासाठी तिसरा पैसा वापरणे.

तुमच्या मुलांना शिक्षित करा, त्यांना उच्च शिक्षणासाठी पैसे मोजा.

(म्हणजे भविष्यातील कर्ज)

४. चौथा पैसा पुढील (पुण्य) ठेवीसाठी वापरणे.

म्हणजे शुभ प्रसंग, अशुभ प्रसंग, परोपकाराच्या अर्थाने, संतांची सेवा करणे आणि असहायांना मदत करणे या अर्थाने.. !

तर.. ही ४ पैसे कमावणारी गोष्ट आहे. आपल्या प्राचीन कथांमध्ये किती उच्च विचार आहेत..!

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित 

सांगली – ४१६ ४१६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दिसतं असावं…… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

??

☆ दिसतं असावं…… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

परवा दोन मुंजीना गेलो होतो मुंबईला. दगदग, धावपळ करून माणसं येतात, जमतात, लगेच गायब होतात. पहिल्यासारखं आधी चारपाच दिवस तयारी मग बोडण किंवा पूजेला थांबण्याचे दिवस इतिहासजमा झाले. वेळ नाही, जागाही कमी आणि उत्साह पण कमी झालाय एकूणच. प्रथा चालत आल्यात म्हणून पार पाडल्या जातात. संध्या कोण करतंय तसंही आता? मुंज झालेल्या मुलाने विचारलंच चुकून तर आधी वडिलांना यायला हवी ना. त्यामुळे तिची सुरवातच होत नाही. ती केली म्हणजे काय होतं, नाही केली म्हणून काय होतं याचा उहापोह नको. मी ही ती एकदाही केलेली नाही. पण संस्कार असतात, ते करायचे एवढं खरं. मुलगा आता शिकायला आश्रमात जाणार नाही, ब्रम्हचर्य पाळणं शक्य नाही लग्न होईस्तोवर, बरं, त्या काळासारखे बालविवाह झाले असते तर थांबायची गरजही नव्हती. पण एकूणच इतर बाबी, हेतू, कारणं बदलली तरी संस्कार चालू आहे अजून तरी तो.

धार्मिक गोष्टं बाजूला राहू दे, मी जातो कारण की तिथे सगळे भेटतात. आपल्या मुंजीत ज्यांनी लगबग केली त्या आत्या, काकू. मामा, माम्या आता थकलेल्या असतात. त्यांना भेटता येतं, म्हणून जायचं. हे सगळे म्हातारे लोक उठून दिसतात, वेगळे दिसतात त्या सगळ्या झगमगाटात. गळ्याशी कातडी लोंबत असते. हातात काठी, ती नसली तरी, आहे पण आणलेली नाहीये, हे कळतं. फार वेळ उभं रहावत नाही, बसूनही रहावत नाही. उकाड्याचा त्रास होत असतो. त्यांची बायकोही त्याच वयाची असते. म्हातारी नटून थटून आलेली असते. दिवस खराब म्हणून सोन्याचा दागिना घरात असतो. पण मोत्याचे चारपाच घालतीलच. कधीकाळी कमरेपर्यंत असलेल्या शेपटाची मानेवर टोचेल एवढी लांब बोन्साय वेणी असते किंवा मग अंबाडा घालून त्यावर गजरा गोल फिरवलेला असतो. ब्लाउजच्या हाताला घड्या असतात. म्हातारी बाहेर ब-याच दिवसात गेलेली नाहीये हे कळतं. हाताशी छोटीशी पर्स असते. कुणी आलंच बाळाला घेऊन भेटायला तर? म्हणून आत पन्नासाच्या नोटा असतात.

त्यांच्या वयाचे एकत्र छान कोंडाळं करून बसतात. गप्पा असतात त्या म्हणजे फक्त चौकश्या – तब्येतीच्या, अनुपस्थित माणसांच्या, कुणाचं तरी कळलं का – अशाच. कुणाकडे सुनेने, मुलीने मिरवताना अडचण नको म्हणून आणून दिलेलं वाह्यात पोर असतं. ते काही केल्या एका जागी बसत नाही आणि म्हातारीचा प्राण कंठाशी येतो. तरीपण ती त्याला सांभाळत असते आणि गप्पात भाग घेत असते. त्याच गावात असेल घर तर जास्त वेळ बसता येतं. पण जेवणं झाल्यावर लोकल, रिक्षा पकडून एसटी/रेल्वे पकडायची असेल तर तारांबळ उडते त्यांची. जाऊ ना वेळेत? या धास्तीपोटी लक्ष लागत नाही आणि मग ‘चला लवकर’चा धोशा एक कुणीतरी लावतो. कुणाचं अर्धांग घरीच असतं त्यामुळे लवकर जाणं गरजेचं असतं. धावपळ होते. निघावं लागतं. ब-याच वर्षांनंतर कुणाची तरी भेट होते. आठवणी निघतात. दाटून येतं. तो/ती पाया पडतात. म्हाता-यांना भरून येतं.

आता लोकांना आशीर्वाद तरी कुठे देता येत आहेत. ‘आयुष्यमान भव’ हे कानावर पडायला तर हवं ना. कुणीतरी अजून आशीर्वाद देतंय वाकल्यावर ह्यात पण अजून आपण म्हातारे नाही झालो असा छुपा आनंद आहे खरंतर. दरवेळेला कुठे जाणं झालं की सगळी माणसं बघून बरं वाटतं. दरवर्षी कार्य निघेलच असं नाही, एवढी संख्याही आता घराघरात नाही. त्यामुळे भेटी होणं अवघड होत जाणार यापुढे. म्हणून मी आपला वर्षातून एकदा फुलपुडी टाकल्यासारखा का होईना पण जाउन येतो.

गदिमांची आई पुलंना म्हणाली होती, ‘माणसाने दिसतं असावं रे’. खरंय, माणसाने दिसतं असावं, कोण कधी ‘नसतं’ होईल काय सांगावं?

लेखक : जयंत विद्वांस

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२० ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२० ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

देवळांच्या नावांची गंमत…

श्रीजोगेश्वरी आईच्या अगदी समोरून रस्ता जातो ना, तो दातार व दीक्षित वाड्यावरून फरासखान्यापर्यंत पोहोचतो. पुढे एक सुंदर हौद होता तिथे शंकराची मूर्ती व शिवलिंग होत. मध्यभागी असलेली ऐटदार बाहुली तिच्या डोक्यावरचा डेरेदार घडा त्यातून उसळणार, चमचमणारं कारंज आणि हौदातले सूळकन सटकणारे मासे हे आम्हा मुलांचं प्रचंड आकर्षण होत. तिथेच आता दगडूशेठ गणपती विराजमान झाले आहेत. तसेच दगडूशेठ यांच्या नावाचं दत्त मंदिर बाबुगेनू चौकाजवळ आपल्याला दिसतं. अप्रतिम तेजस्वी अतिशय देखणे दत्तगुरु पाहतांना भान हरपून जात. गणपती शेजारी मजूर अड्डा, फरासखाना आणि हुतात्मा भास्कर दा. कर्णिक यांचा स्मृती स्तंभ अजूनही जुन्या स्मृती जागवत ठामपणे उभा आहे. पुढच्या बेलबाग चौकात सिटी पोस्ट, नगर वाचन मंदिर, कोपऱ्यावरचं स्वस्त आणि मस्त बायकांचं आकर्षण ठरलेल साड्यांचे दुकान ‘मूळचंद क्लाथ ‘अजूनही आपलं नांव राखून आहे. या चौकात आल्यावर पुण्याबाहेरच्या लोकांचे पाय फडणीसांच्या बेलबागे कडे हमखास वळतात. अजूनही पूर्वजांचा अभिमान बाळगणारे फडणीसांचे वंशज तिथे राहतात. श्रीविष्णू दर्शनाबरोबर मोरांची भुरळ लोकांना पडते. बाहुलीच्या हौदा कडून डावीकडच्या रस्त्याने शनिवार वाड्याचे बुरुज, पेशवे कालीन श्री गणेश देऊळ, आणि प्रचंड दरवाजाचा शनिवार वाडा पर्यटकांना साद घालतो. तिथलं विस्तीर्ण मोकळं पटांगण म्हणजे आमची सायकल प्रॅक्टिसची हमखास जागा होती. जोगेश्वरी जवळच्या ‘कुलकर्णी अँड सन्स’ मधून एक आणा तासाने भाड्याची सायकल घेऊन आम्ही सीटवर न बसता नुसती सायकल चालवत शनिवारवाडा गाठत होतो. आप्पा बळवंत चौकात फारशी गर्दी नसायची. पण प्रचंड भीतीमुळे पायडल वरचा पाय जमिनीवरच पडायचा. एकदा वसंत टॉकीजला ‘मेरी झाशी नही दूँगी’ हा सिनेमा बघितला. झाशीची राणी डोक्यात शिरली. बाहू स्फुरायला लागले, मग ठरवलं जोगेश्वरी पासून एकदम सीटवर बसूनच सायकलवर स्वार व्हायचं. झाशीच्या राणीचा प्रभाव दुसरं काय! ☺️जिद्दीने चंद्रबळ आणून वळण पार करून प्रभात टॉकीज जवळ आलो. समोर हेsss भल मोठ्ठ नवीन सिनेमाचं पोस्टर लागल होत, त्यात सायकल वरून बागेत फिरणारा नट्यांचा घोळका होता. पोस्टरवर आम्हीच असल्याचा भास झाला, आणि काय सांगू!ते स्वप्न रंगवताना आम्ही एका सायकल स्वाराला धडक दीली. एक सणसणीत शिवी आणि” मरायचंय का?” हे शब्द कानावर पडता क्षणी स्वप्न तुटलं ” घूम जाव” म्हणत चपळाईने मागे वळलो आणि काय सांगायचं तुम्हाला? अहो!नंतर कितीतरी दिवस सायकलिंग बंद पडलं. सासरी केल्यावर मात्र धुळ खात पडलेली सायकल चकचकीत केली. रेल्वे क्वार्टर गावाबाहेर असल्यामुळे मुलांना डबल सीट शाळेत सोडणं, महिन्याचा किराणा भाजी आणण हा पराक्रम सायकलवर बसून करता आला. कारण शनिवार वाड्यासमोरच्या मोकळ्या पटांगणातल्या बटाट्या मारुतीला लहानपणी नवस केला होता ना!नवल वाटलं नां नांव वाचून? हो बटाट्या मारुतीच होता तो. लोखंडी लांबलचक सळ्यांच्या भिंतीच ते छोटसं टुमदार मारुती मंदिर होत. भांग्या मारुती झाला, गावकोस मारुती झाला, आणि हो भाऊ महाराज बोळाजवळचा जिलब्या मारुती पण कळला. परमराम भक्त मारुतीराया तुला आमचा शिरसाष्टांग नमस्कार.

– क्रमशः… 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक गमतीदार प्रवास ☆ सौ.अंजली दिलीप गोखले ☆

सौ.अंजली दिलीप गोखले 

🪷 मनमंजुषेतून 🪷 

☆ एक गमतीदार प्रवास ☆ सौ.अंजली दिलीप गोखले ☆

काही दिवसापूर्वी आम्ही दोघी मैत्रिणी कामासाठी बेळगावला सकाळी जाऊन संध्याकाळी परत आलो. जाताना लवकरच निघालो. स्टेशनवर जाऊन तिकीटे काढली समोरच जोधपूर बेंगलोर एक्सप्रेस लागलेली दिसली.

२-३ बोगीमध्ये चढून पाहिले भरपूर गर्दी. कोठेच बसायला जागा सापडेना. पुनः खाली उतरून दुसऱ्या बोगीत शोध! आमची धावपळ बघून इडल्या विकणाऱ्या भैयाने सांगितले, “बहेनजी, जल्दी बैठो कही भी गाडी छुटने वाली है। भीड तो है ही।” पटदिशी आम्ही चढलो. आत गच्च गर्दी. गर्दीतच सरको सरको म्हणत कशातरी टेकलो तोच गाडी सुटली.

हुश्य करून नजर फिरवली तर बापरे. सगळीकडे बिहारी बसलेले. त्यांचे ते अवतार, नजरा बघून सकाळच्या थंडीत घाम फुटला. महिलांसाठी सेपरेट जागा असते तशी ही बोगी पुरुषासाठी राखीव का आहे असेच वाटले. त्यांचे खोकणे शिंकणे पाहून आम्ही पर्स मधून मास्क काढून आमची सुरक्षा वाढवली.

लोकांची सारखी ये जा सुरु होती. कडेला बसल्यामुळे धक्के खावेच लागत होते तेवढ्यात ढोल घुंगरू वादन सुरुझाले. बरोबरची डोक्यावरून पदर लपेटलेल्या बाईने रामाचा धावा भसाड्या आवाजात सुरु केला. एक हात पुढे पसरून पैसे मागणे सुरु. नेमके आमच्याकडे सुटे पैसे सापडेना. दहाची नोट दिल्या शिवाय गत्यंतर नव्हते.

आम्ही दोघी शेजारी खेटून बसूनही बोलायला काही मिळेना. चहा वाले, इडली वडा यांची ये जा तर अखंड!

बाहेर हिरवीगार शेती डोळ्याला दिलासा देत होती. निसर्ग मुक्तपणे आपले सौंदर्य उधळत होता. ते पाहून मात्र मन प्रसन्न झाले. शेतात ऊस डोलत होता. हिरवीगार पालेभाजी मनाला तजेला मिळवून देत होती.

स्टेशनवर आणखीन प्रवासी चढतच होते उतरायचे मात्र कोणीच मनावर घेत नव्हते. कसे तरी अडीच तास गेले आणि बेळगावच्या खुणा दिसायला लागल्या. मनोमन हुश्य झाले पण हाय! मध्येच रेल्वे थांबली ते थांबलीच. का तेही समजेना. बिहारी चे आवाज वाढले. गप्पा वाढल्या. खाण्याचे डबे उघडून खाणे सुरु झाले आम्हाला तर हालताही येत नव्हते. कुणीकडून आज चाललोय प्रवासाला असेच वारंवार मनात येत होते.

अर्ध्या तासाने एकदाचा प्रवास पुनः सुरु झाला. गाडीच्या दोन्ही बाजूंना आता घरे सुरु झाली. इतकी जवळ घरे की आतले सगळे दिसत होते. लहान मुले हात वर करून खदा खदा हसत होती. बायका बाहेरच भांडी घासत होत्या. दोन्ही कडच्या घरांमधून गाडी सुसाट धावत होती.

अखेर एकदा बेळगाव स्टेशन आले. हुश्य करून खाली उतरलो. बेळगाव स्टेशन छान स्वच्छ आहे.

काम झाले की आम्हाला लगेचच परतायचे होते. पुढचा परतीच्या प्रवासाचीच धास्ती होती. आमचे तिथले काम अपेक्षेपेक्षा खूपच पटकन झाले. रेल्वे पकडायची म्हंटले तर ३-४ तास उगीचच थांबायला लागणार होते म्हणून एस. टी. चा प्रयत्न करायचे ठरवले.

कर्नाटक मध्ये आलोय म्हणजे डोसा तर खायलाच पाहिजे. म्हणून त्यावर ताव मारला आणि बेळगाव एस टी स्टँडवर आलो. अपेक्षेपेक्षा जास्त स्वच्छ आहे फार गर्दीपण नव्हती.

आता मात्र आमचे लक जबरदस्त होते. मिरजला जाणारी बस स्टँडवर तयारच होती. आम्ही पटकन चढलो. बसमध्ये बसायला छान जागा मिळाली.

पाच मिनीटांत बस सुटली. आम्ही महाराष्ट्री असल्यामुळे आम्हाला पूर्ण तिकीट काढावे लागले आणि पुढे खरी गम्मत सुरु झाली बस हायवे वरून जाणार नव्हती. छोट्या छोट्या गावांचे स्टॉप घेणार होती.

पहिला स्टॉप आल्या बरोबर कर्नाटकी महिलांची झुंड दारापाशी धावत आली आणि बसमध्ये मोर्चा आल्या सारख्या महिला अक्षरशः घुसल्या. टिपिकल साड्या, डोक्यात गजरा, नाकात चमकी. गळाभरून मोत्याच्या माळा, घसघशीत मंगळसूत्र आणि कन्नड बोलणे. बघता बघता बस खचाखच भरली. ड्रायव्हर कंडक्टर आणि जेमतेम सहा सात पुरुष प्रवासी. बाकी सगळ्या महिला. सगळ्याजणी कुठल्याशा यात्रेला चालल्या होत्या.

येताना रेल्वे मध्ये आम्ही दोनच महिला आणि आता कसे बसे बिचारे ७-८ पुरुष. तिकडे महिलांना बसप्रवास पूर्ण मोफत त्यामुळे ता आनंदात सगळ्या यात्रेला चालल्या होत्या. कंडक्टरचे काम पैसे घेऊन तिकीटं काढणे नाही तर त्यांचे आधारकार्ड तपासणे. तो आपले प्रत्येकीचे कार्ड नुसते बघूनच परत करत होता. बिचारा गर्दीमध्ये घामेघूम झाला होता.

पुढचे स्टॉप आले की बायका अजूनच येत होत्या. एक सिट कशीबशी रिकामी झाल्यावर दुसऱ्या बाईने पटकन बसकण मारली आणि झाले, खिडकी शेजारची बाई डोळे वटारून तिच्या दंडाला ढकलायला लागली. तोंडाने डब्यात दगड खडबडल्या सारखी बडबड सुरु होती. बसलेली बाई पण कमी नव्हती. तिचाही जोरजोराने बड बड करत हातवारे करून ड्रामा सुरु झाला. दोघीही थांबायला तयार नव्हत्या. दोघीचे आवाज टिपेला पोहोचले. ढकलाढकली सुरु झाली. कंडक्टरने बेल वाजवून बस थांबवली.

आता इतर बायकांचा गलका वाढला. कंडक्टर जोरात ओरडला. त्यातला पोलीस शब्द तेव्हढा कळाला. बापरे ! पुढे काय होणार म्हणून आमच्याच पोटात गोळा आला.

पण त्या वाक्याचा अर्थ कळाल्यामुळे बसमध्ये एकदम सन्नाटा पसरला आणि कंडक्टरने डबल बेल मारली. आम्ही सुटकेचा निश्वास टाकला.

छोटी छोटी गावं येत होती. चार महिला उतरल्या की दहा घुसत होत्या. गावाची नावपण आम्हाला समजत नहती कारण सगळी कन्नड मध्ये. थोड्या वेळाने एक मोठे गाव आले एका दुकानाच्या बोर्डवर इंग्रजी नाव दिसले : हुकेरी !

इथेही स्टॅडवर गर्दी ! दोन जाडजुड राजस्थानी लमाण्या वाटाव्या अशा महिला सगळ्याना ढकलत आत चढण्यात यशस्वी झाल्या. यानी आमच्या सारखेच फुल तिकीट काढले. त्या दोघीमुळे कंडक्टरलाच जागा राहिली नाही. बस इतकी गच्च भरली होती पण ड्रायव्हर सराईतासारखा जोरात गाडी हाणत होता.

कर्नाटकात बस फुकट शिवाय प्रत्येकीला २००० रु दर महिना मिळतात म्हणे त्यामुळे शेतात काम करायला कोणी तयार नाही. पुरुषांना घरी बसवून बायका सतत फिरत रहातात असे ऐकले.

पूर्वीचे घर, चूल आणि मूल हे या महिलांनी कधीच झिडकारलय. आता पुरुष बिच्चारे झालेत कारण त्यांना काम ही करावे लागते, पैसाही मिळवावा लागतो आणि अशा वांड बायकाना सांभाळत संसार करावा लागतो.

भावाना बहिणींचा फारच पुळका आलाय खरं पण पुढे काय वाढून ठेवलय परमेश्वर जाणे !

आमचा स्टॅण्ड आल्यावर हुश्य करून उतरलो आणि बेळगावच्या बसला टाटा करून घरची वाट धरली.

© सौ. अंजली दिलीप गोखले

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “नरहरीरायाचे दर्श…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “नरहरीरायाचे दर्शन…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

नरहरी राया यायला निघाले बघ तुझ्या दर्शनाला..

 मनातूनच अशी ओढ लागते.. तुझी तीव्रतेने आठवण येते.. आणि यायला निघतेच….

 तशी सगळ्याच देवांवर श्रद्धा आहे पण तू……. कुलदैवत आहेस ना.. म्हणून तुझ्यावर जरा जास्त माया आहे…. त्या ओढीनेच निघते.

मला तर वाटते… कुलदैवत ही संकल्पना यातूनच आली असावी.

हा देव माझा आहे….. ही भावना मनात रुजते.. त्या देवी.. दैवता विषयी मनात भक्ती बरोबरच आपलेपणा वाटतो… तो जवळचा वाटतो.. तो देव हक्काचा वाटतो…

टेंभुर्णी फाट्याला वळून वीस-बावीस किलोमीटर गेलं की येतं तुझं नरसिंगपुर….

नीरा नदीच पाणी संथ वाहतं असतं. पुलावर गाडी गेली की लांबूनच कळसाचं दर्शन होतं.

अरे देऊळ जवळ आलं की……

थोड्याच वेळात तुझ्या पायऱ्यांपाशी येऊन पोहोचते. तुझे ते भव्य बुरूज त्यावर उडणारे पोपट पहात क्षणभर उभी राहते. नंतर पायऱ्या चढायला सुरुवात करते. हल्ली अर्ध्या पायऱ्या चढून गेलं की जरा वेळ थांबते… सत्तरी झाली रे आता.. पूर्वी कसं भरभर चढून येत होते. आसपास बघते थांबते.

 आजकाल अस थांबणं पण आवडायला लागलं आहे… न पाहिलेलं दिसायला लागलं आहे….

आधी प्रल्हादाला भेटते. त्या लेकराचं दर्शन घ्यायचं.. त्याच्या थोर भक्तीमुळे तू आम्हाला मिळालास.

 आरतीत म्हटल्याप्रमाणे..

” प्रल्हादाच्या इच्छेसाठी

 देव प्रगटे स्तंभा पोटी

 ऐसा ज्याचा अधिकार

 नमु त्यासी वारंवार…. “

त्याला वंदन करून मग तुझ्याकडे यायला निघते. तुझ्यासमोर बसलं की मन आनंदून जातं…. प्रेमभराने तुझ्याकडे बघत राहते. लाल पगडी, पिवळा पितांबर, शेला पांघरलेला, गळ्यात हार.. तुझं रूप मनात साठवते..

मंद समई तेवत असते. धूप, उदबत्ती फुलांचे हार, यांचा संमिश्र वास आसपास दरवळत असतो.

समोर बसून काय बोलू रे तुझ्याशी…. आता ते पण कमी झालं आहे… तुला सगळं कळतं.. आता मागणं तर काहीच नाही. आहे त्यात समाधानी आहोत. तुझी सेवा घडू दे. अंतरंगाला तुझा ध्यास असू दे. तेवढ्यानी मन शांत होणार आहे… तूच एक त्राता आहेस हे समजले आहे.

” दया येऊ दे आमची मायबापा

करी रे हरी दूर संसार तापा

अहर्निश लागो तुझा ध्यास आम्हा

नमस्कार माझा नरहरी राया… “

प्रेमाने परत डोळे भरून बघते.. आणि निघते लक्ष्मीआईंना भेटायला…

 एक सांगू…. तुझा थोडा धाक वाटतो रे.. बापासारखा…

लक्ष्मी आई मात्र भोळी भाबडी.. साडी चोळी घालून. साधंसं मंगळसूत्र घालून उभी असते. तिला काही भपका नाही.. मला तर ती आई, मावशी, काकू सारखीच वाटते.. आमची वाट बघत तुझ्या बाजूला उभी असते बघ… तिच्याजवळ दारात बसून मनमोकळं बोलते.

बापाशी बोलता येत नाही ते आईलाच सांगणार ना रे लेक…… तिला सगळं सांगून झालं की मन भरून येत.. शांत वाटतं. तिचा आश्वासक चेहरा बघून मन तृप्त होतं…

…. प्रदक्षिणा पूर्ण करून तुझ्याकडे येते. परत दर्शन घेते.. तू भक्कम पाठीशी आहेस म्हणून काळजीच नाही रे…. देवळात येऊन आसपास हिंडून, तुला बघून खूप आनंद होतो बघ… म्हणूनच आठवण आली की येते तुला बघायला….

आता मात्र निघते रे… खूप कामं पडली आहेत… काही नाही रे….. आज सकाळीच तुझी आठवण आली म्हणून आले होते भेटायला…… लागते आता कामाला… दूध आलं आहे ते तापवायचे आहे.. चहा करायचा आहे… पेपर आत घ्यायचा आहे.. सुरू झाला आमचा संसाराचा गाडा…..

तुम्हाला मनातलं सांगू का…..

पूर्वीसारखं वरचेवर त्याला भेटायला जाणं होत नाही.. मग अशीच जाते….. हल्ली तेच आवडायला लागलं आहे. कुणी नसतं देवळात… नरहरी राया आणि मी … त्या निरामय शांततेत त्याच्याशी मनानी जोडली जाते … ते काही क्षणच खरे असतात.. सच्चे असतात…. निर्मळ असतात हे आता कळलेले आहे… त्यामुळे ते फार हवेसे वाटतात….

 तुम्ही पण अनुभव घेऊन बघा… तुम्हाला पण येईल ही प्रचिती…

…… आपल्या मनातल्या देवाची…. मग तो देव कुठलाही असू दे…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डोंगल ते वाय फाय (बालपण)… भाग – ५ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी  ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? मनमंजुषेतून ?

डोंगल ते वाय फाय (बालपण) भाग – ५ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

श्रावण तसा मन भावन. भरपूर पाऊस होऊन गेलेला. श्रावणाची रिमझिम, उनं पावसाचा खेळ, सोनेरी सूर्याची किरणे त्यात पडणारा पाऊस मध्येच आकाशात इंद्रधनुष्याचे आगमन, मन प्रसन्न करणारे वातावरण.

मातीच्या भिंतीनी धरलेली ओलं. प्रत्येक भिंतीवर बाहेरून उगवलेले गवत आणि आघाडा गवतावरची फुले, बारीक तुरा. रस्त्यावर पण हिरवळ. झाडानी धरलेलं बाळस. परसात भारलेली फुलांची झाड. फुलांच्या वसातील दरवळ. त्यात गुलबा क्षची लाल चुटुक फुले, झेंडूचा वास अनेक प्रकारच्या वेलिंचे जाळे, न सांगता उगवलेले. ही साक्ष म्हणजेच, श्रीचे आगमनाची चाहूल.

 घरात गणपतीची लगबग.

गणपतीचा कोनाडा व जवळ जवळ सगळा सोपा रंगानी सुशोभीत केलेला. श्रीची मखर तयार करण्यासाठी दिवस रात्र एक.

 कुंभार वाड्यात सगळ्यांची वर्दळ. अनेक प्रकारच्या गणेश मुर्त्या तयार झालेल्या. त्यातीलच एकाची निवड करून आमच्या नावाची चिठी त्या गणेशाच्या किरीटवर लावलेल्या असतं.

 एकदाचा तो दिवस आला की सगळीकडे धामधूम. आम्ही गल्लीतील सर्वच जण एकत्रित मूर्ती आणित असू. प्रत्येकांच्या कडे पाट. त्यावर श्री बाप्पा विराजित होतं असतं. कुंभारला पान सुपारी व दक्षणा देऊन मुर्त्या बाहेर पडत, त्या निनाद करतच. प्रत्येकाकडे

घंटी, कैताळ, फटाक्यांचा आवाज आणि जयघोष करत, आपापल्या घरी बाप्पा येत. दरवाज्यात आले की, त्याच्यावरून लिंब लोण उतरून टाकले की बाप्पा मखरात बसत. फटाके फक्त गणपतीच्या सणात मिळत एरवी नाही.

 प्रत्येकाच्या घरी रोज सामूहिक आरती, मंत्रपुष्प, प्रसाद वाटप हे ठरलेलं. रोज वेगवेगळे नैवेद्य. असे दहा दिवस कसे सरत जात होते ते कळत नसे. त्यात भजन कीर्तन वेगळेच. शाळेत पण गणपती बसवत व ते आणायला आम्हालच जावे लागे. रस्ता पावसानी राडेराड कुठे कुठे निसरडे रस्ते. त्यावेळी डांबरी सडक नव्हतेच. त्यात आम्हा मुलांची मिरवणूक. नेमके दोन चार जण तर पाय निसरून पडत असतं. मग ते इतर जण हसतात म्हणून, घरी पोबारा करीत.

 सातवी संपली बरेच मुले दुष्काळी परिस्थिती मुळे इकडे तिकडे कामाला लागली. मलाही पाणी भरण्याचा कंटाळा आलेला. मी पण सातवीत जे गाव सोडले ते आजतागायत!

 गावापासून पाचशे किलोमीटर लांबवर मी आठवीत प्रवेश घेतला त्यावेळी माझं वय होतं ते फक्त 12 वर्षे! एक वर्ष लवकरच शाळेत घातलं गेल.

अनोळखी गाव व तिथले राहणीमान ही वेगळेच. भाषा मराठी पण मराठवाडी. येथे मात्र गोदावरी कठोकाठ वाहत होती. दिवसातून चार वेळा मुबलक पाणी नळाला येत असले तरी, माझी अंघोळ ही गंगेकाठी चं सलग तीन वर्षे नदीत अंघोळ. महापुरात पण पोहण्याचा सराव.

 तस हे तालुक्याचे गाव पण चहुकडे मोठे मोठे दगडी वाडे. एक एक दगड दोन फुटांचा लांब आणि रुंद. निजामशाही थाटातील वड्यांची रचना. तीन तीन मजली वाडे. निजामचे बहुतेक सगळेच सरदार, दरकदार असावेत असे. प्रत्येक घराला

टेहळणी बुरुज पण असलेला. अजूनही बरेच वाडे जश्यास तसेच आहेत.

 मंदिराच गाव असं म्हटलं तर वावगे ठरु नये. गावात बरीच हेमाड पंथी मंदिरे. गोदा काठी तर अगणित मंदिरे. काठाला दगडी मजबूत तटाची बांधणी. बऱ्याच मंदिराचे जीर्णोद्धार हे अहिल्यादेवी होळकर ह्यांनी केलेले. गावात सुद्धा दगडी रस्ता. पण गाव हे गल्ली बोळाचे. अरुंद रस्ता व बोळ. वाडे मात्र टोलेजंग. गाव तस सनातनी धार्मिक. पूजा, अर्चना, भजन कीर्तन, पुराण हे सगळीकडे चालूअसलेलं. का बरं असणार नाही.

हे चक्क संत जनाबाईचे जन्मस्थान! संत जनाबाईचे गाव. वारकरी संप्रदाय पण मोठा. सगळ्या देवी देवतांची मंदिरे.

त्यात तालुक्याचे गाव. निजामशाहीचा ठसा मात्र जश्यास तसाच होता. घराच्या दगडी महिरपी चौकट्या, त्यावर महिरपी सज्जा, सज्यातून वरच्या बाजूला महिरपी लाकडी चौकट. अवाढव्य मोठी घरे प्रत्येक घरात दोन्हीही बाजूला पाहरेकऱ्यांचा देवड्या लादनी आकारात सजलेल्या. प्रत्येक घरात सौजन्य, ममता आस्था, कणवाळू प्रिय जनता.

 तरीपण मला तिथे रमायला काही दिवस लागले, मित्र पण मिळाले. पण आमचे गावठी खेळ तिथे नव्हतेच. प्रत्येक घरात कॅरम बोर्ड, व पत्ते. पत्त्यात पण फक्त ब्रिज खेळण्यात पटाईत लोक दिसलें. कब्बडी खोखो हे मैदानी खेळ, मला आवडणारा खेळ फक्त लेझिम होता, बस्स. चिन्नी दांडू, वाट्टा, धापा धुपी, ईशटॉप पार्टी नव्हतीच! सायकल पण नव्हती! हे विशेष! शाळा झाले की रोज रेल्वे स्टेशनं वर नियमित फिरायला जाणे. सकाळी तासभर नदीत डुंबणे. कधीतरी मित्रासह मंदिरात जाणे. एवढाच कार्यक्रम.

शाळेत असताना मात्र बँड मध्ये सहभागी म्हणून पोवा फ्लूट वाजवायला घरी मिळाला. त्यावर मास ड्रिलचे काही वेगवेगळ्या धून आणि राष्ट्रगीत वाजवत बसणे. गावात असताना भजनात बसत असल्यामुळे सूर पेटीचा नाद लागलेला होता. तो आता येथे येऊन मोडला. स्वरज्ञान, राग आलाप हे आता फक्त फ्लूट वर येऊ लागले. कारण सुरपेटी वाजवायला मिळत नव्हतीच. कसेबसे तीन वर्षे त्या संत जनाबाईच्या गावात काढले, पण बालपण विसरून गेलो. खरी खोटी माणसे वाचवायला फार लवकरच शिकायला मिळाले.

 सुट्टीत गावी आल्यावर काही जुने मित्र भेटत, काही कायमचीच निघून गेलेली होती.

कॉलेज सुरु झाले तसे परत नवीन मित्र मंडळी भेटत गेली. आणि जगण्याची व्याख्या पण बदलत गेली.

क्रमशः…

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ याद ना जाये… – लेखक – श्री श्रीनिवास बेलसरे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

??

☆ याद ना जाये… – लेखक – श्री श्रीनिवास बेलसरे ☆  श्री सुहास रघुनाथ पंडित 

काल संध्याकाळी सोसाट्याचा वारा सुटला होता. नंतर कितीतरी वेळ पाऊस नुसता कोसळत होता. सगळीकडे १५ मिनिटात पाणीच पाणी झाले. घराच्या उंच गॅलरीतून दिसणा-या रस्त्याच्या तुकड्यावर क्षणाधार्त रंगीबेरंगी छत्र्या फिरताना दिसू लागल्या. पथदिव्यांचा प्रकाश रस्त्यावरील पाण्यात पडल्यावर वेडीवाकडी प्रतिबिंबे लक्ष वेधून घेत होती. कॉलनीच्या कंपाउंडमधील उंच वाढलेल्या झाडांच्या फांद्या आणि पाने अक्षरश: वेड्यासारखी हलत होती. गुंगीत घर सोडून चाललेल्या एखाद्याला कुणीतरी दंड धरून गदगदा हलवावे तसे! त्यावेळी शेंड्याजवळच्या पानामागे लपलेले एक कावळ्याचे घरटे दिसले. घरटे म्हणजे काय दोन फांद्या फुटत होत्या तिथे काड्याकाटक्यांचे तुकडे कसेबसे गोलगोल रचलेले. आता घरट्यात काहीच नसावे कारण पिल्ले असती तर कावळ्यांनी कोलाहल करून सगळा परिसर डोक्यावर घेतला असता. कावळेही कुठे दिसत नव्हते.

पावसाळ्यात हे ठरलेलेच असल्यासारखे चालू असते. अनेक पक्षांची पिले उडून गेलेली घरटी उध्वस्त होतात. पण त्याचे खुद्द त्या पक्षांनाही फारसे काही वाटत नाही. त्यांचे सगळे आयुष्य निसर्गाने कसे शिस्तीत बसविलेले असते. ठरलेल्या ऋतूतच जन्म, ठरलेल्या वेळीच प्रणयाराधन. ते झाल्यावर दिवसभर मनमुराद शृंगार. मग जेंव्हा दोनतीन नव्या पाहुण्याची चाहूल लागते तेंव्हा त्यांच्यासाठी तात्पुरता निवारा तयार करायची दोघांची लगबग. त्यासाठी दिवसभर आळीपाळीने कुठून कुठून काड्या, कापूस, तारा, काहीही जमा करत राहणे. मग पक्षीण अंडी देवून त्यावर दिवसदिवस बसून राहते. एका दिवशी अंड्यातून एकही पीस अंगावर नसलेले चिमुकले जीव बाहेर आले की काही दिवस डोळ्यात तेल घालून त्यांचे रक्षण. पिलांना मिळेल ते अन्न चोचीने भरवायची जबाबदारी मात्र आई-बाबा अशी दोघांचीही ! आणि पिले काही दिवसातच मोठी होऊन, उडून गेली की स्वत:ही त्या घराचा त्याग करून निघून जायचे. कसा अगदी संन्याशाचा संसार !

कालच्या त्या कावळ्यांच्या घरट्याचे अवशेष पाहताना सहज आठवले. लहानपणी कितीतरी गोष्टी अगदी वेगळ्या होत्या. मोठ्या शहरातील काही प्रशस्त बंगले, मोजकीच दुमजली घरे सोडली तर बहुतांश घरे बैठी आणि कौले किंवा पत्रे असलेली असायची. सिमेंटचे किंवा लोखंडी पत्रे लाकडी बल्ल्यांवर खिळ्यांनी ठोकून बसविलेले असत. सिमेंटचे पत्रे आणि पन्हाळीच्या उंचवटयाखालील एवढ्याश्या जागेत सायंकाळी एकेक चिमणी येऊन बसायची. रात्रभर तिचा मुक्काम घरात किंवा व्हरांड्यात असायचा. खाली जमिनीवर अंथरून टाकून झोपल्यावर आम्ही आज किती चिमण्या मुक्कामाला आहेत ते मोजायचो. रात्रीपुरत्या आमच्या पाहुण्या होणाऱ्या चिमण्या पहाट होताच बसल्या जागीच थोडी थोडी चिवचिव करून भुर्रकन उडून जात. चिमण्याशिवाय कोणताही पक्षी कधी घरात येत नसे.

चिमण्या कधीकधी छताजवळ घरटीही करत. मग अचानक अगदी बारीक आवाजात अधीर असे ‘चिवचिव’ ऐकू येऊ लागले की समजायचे चिमणीला पिल्ले झालीत. मग चिमणा चिमणी त्या पिल्लांना दिवसभर काही ना काही भरवत. पिल्ले अन्नासाठी फार अधीर होत. उतावीळपणे ती कधीकधी चिवचिवाट करून हळूहळू पुढे सरकत आणि त्यातले एखादे उंचावरून खाली पडे. ‘टप्प’ असा पिलू पडल्याचा अभद्र आवाज आला की जीव कळवळत असे. एवढासा जीव इतक्या उंचावरून जमिनीवर पडला की अर्धमेला होऊन जाई. पिकट लाल-पांढुरके लिबलिबीत अंग, पारदर्शक त्वचेतून दिसणा-या त्याच्या लाल निळ्या रक्तवाहिन्या, अंगापेक्षा बोंगा अशी डोनाल्ड डकसारखी पिवळी मोठी पसरट चोच, धपापणारे हृदय असा तो अगदी दयनीय गोळा असे. फार वाईट वाटायचे. लगेच आम्ही मुले दिवाळीतील पणती कुठून तरी शोधून आणायचो. तिच्यात पाणी भरून त्याच्याजवळ ठेवायचो. शेवटच्या घटका मोजत असलेले ते पिल्लू स्वत:ची मानसुद्धा उचलू शकत नसायचे. मात्र आम्हाला भूतदया दाखवायची फार घाई झालेली असल्याने वाटायचे त्याने घटाघटा पाणी प्यावे, ताजेतवाने व्हावे आणि उडून परत आपल्या घरट्यात जावून बसावे. अर्थात असे काही व्हायचे नाही. लहान मुले देवाघरची फुले असतात, म्हणे ! पण देव त्याच्या घरच्या अशा किती निरागस फुलांच्या प्रार्थना नाकारतो ना ! फार राग यायचा तेंव्हा देवाचा ! पिलू मरून जायचे. त्याच्या मृत्यूचे दृश्य मोठे करुण असायचे. सगळेच अवयव अप्रमाणबद्ध असल्याने विचित्र दिसणारे, मान आडवी टाकून मरून पडलेले पिल्लू, त्याच्या अवतीभवती आम्ही टाकलेले काही धान्याचे दाणे आणि आमच्या त्याला पाणी पाजायच्या प्रयत्नात जमा झालेले बिचा-याला भिजवून टाकणारे पाण्याचे थारोळे ! आम्ही अगदी खिन्न होऊन जायचो. मग आईकडून त्याच्या मृत्यूची खात्री करून घेतल्यावर आम्ही बागेत त्याचा दफनविधी पार पडीत असू. माणसाच्या पिलाच्या मनात जिवंत असलेले सा-या सृष्टीबद्दलचे ते निरागस प्रेम नंतर कुठे जाते कोणास ठावूक !

चाळीसमोर अशीच एक कुत्री होती. तिचे नाव चंपी. गडद चॉकलेटी रंगाची चंपी दुपारी बाराच्या सुमारास चाळीतल्या प्रत्येक घरासमोर जाई. घरातील बाई तिला आधल्या रात्रीच्या उरलेल्या भाकरीचा तुकडा टाकीत असे. तो खावून चंपी पुढचे घर गाठी. कधीकधी बायका आतूनच ओरडत, “काही नाहीये ग चंपे, आज. ” चंपी तशीच पुढे सरकत असे. चंपीला कसे कुणास ठावूक मराठी समजायचे. चंपीलाच काय, ३०/४० वर्षापूर्वीच्या त्या साध्यासरळ काळात गाय, बैल, घोडा, कुत्रीमांजरी, पोपट असे सगळ्यांनाच मराठी छान समजायचे. हल्लीसारखे त्यांच्यासाठी मराठी माणसाला इंग्रजी शिकावे लागत नसे.

पावसाळ्यात चंपीला हमखास पिले होत. त्यावर चाळीतील सगळ्या मुलांचा हक्क असे. पहिले काही दिवस पिलांचे डोळे बंद असल्याने चंपी पिलांजवळून हलायचीच नाही. मग चाळीतील बायका चंपी ज्या कुणाच्या बागेत, आडोसा बघून, माहेरपणाला गेली असेल तिथे जावून तिला भाकरी वाढीत. आम्ही मुले लांबूनच पिलांचे निरीक्षण करायचो. त्यातील पिले आम्ही बुकही करून टाकलेली असत. पांढ-याकाळ्या ठिपक्याचे माझे, काळे सत्याचे, चॉकलेटी न-याचे अशी वाटणी होई. पिले मोठी झाल्यावर, आम्ही त्यांचा ताबा घेत असू. अर्थात त्या काळच्या आईवडिलांच्या गळी असल्या फॅन्सी कल्पना लवकर उतरत नसत. तरीही एकदोन मुले त्यात यशस्वी होत. मग त्या पिलाला खाऊ घालणे, त्याच्यासाठी घरासमोरच्या अंगणात सातआठ विटांचे घर तयार करणे. त्यात त्याला जबरदस्तीने घुसवायचा प्रयत्न करणे अशा गोष्टी आम्हाला कराव्या लागत. अनेकदा पिलू रात्रभर रडे मग घरच्या दबावाने आम्हाला त्याची कायमची मुक्तता करावी लागे. आम्ही एकदोन दिवस तरी हिरमुसले होऊन जात असू.

कॉलेजला असताना एक फर्नांडीस नावाचा मित्र शेजारच्या दुस-या गावाहून येत असे. त्याच्या खिशात त्याने पाळलेली एक खार असायची. असा विचित्र प्राणी पाळणारा म्हणून फर्नांडीस आमच्या कॉलेजसाठी एक हिरोच होता. खार त्याचे ऐकून कॉलेजचे सर्व पिरीयडस होईपर्यंत खिशात गपचूप कशी काय बसून राहायची देवच जाणे. एक दिवस ती मेली. पण सगळ्या वर्गाला उदास वाटले.

तान्ह्या मुलांना पाळणाघरात आणि आईवडीलांना वृद्धाश्रमात ठेवण्याचा आधुनिक ‘करीयरिस्ट’ काळ हा ! आता या असल्या पक्षी आणि प्राण्यांच्या लळ्याच्या गोष्टी तशा कालबाह्यच म्हणा ! पण जुन्या आठवणी आल्या की महंमद रफीच्या आवाजातले आठवणींबद्दलचे गाणेही आठवत राहते –

“दिन जो पखेरू होते, पिंजरे मे, मैं रख लेता,

पालता उनको जतन से, मोती के दाने देता,

सीने से रहता लगाये,

याद ना जाये, बीते दिनो की |”

 *******

लेखक : श्री श्रीनिवास बेलसरे

 ७२०८६ ३३००३

संकलन व प्रस्तुती : सुहास पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares