मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ११ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – ११ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

श्रावण

श्रावण आणि बालपण यांचं अतूट नातं आजही माझ्या मनात मी जपलेलं आहे. आम्ही एका गल्लीत राहत होतो. ज्या गल्लीत एकमेकांना चिकटून समोरासमोर घरं होती आणि तो असा भाग होता की एकमेकांना लागून आजूबाजूलाही अनेक लहान मोठ्या गल्ल्याच होत्या. कुठल्याही प्रकारचं सृष्टी सौंदर्याचं वातावरण तेथे नव्हतंच म्हणजे श्रावणातली हिरवा शालू नेसलेली अलंकृत नववधूच्या रूपातली धरा, श्रावणातलं ते पाचूच बन, मयूर नृत्य असं काही दृश्य आमच्या आसपासही नव्हतं. फारतर कोपर्‍यावरच्या घटाण्यावर हिरवं गवत मोकाट वाढलेलं असायचं. आमच्या घराच्या मागच्या गॅलरीतून खूप दूरवर धूसर अशी डोंगरांची रांग दिसायची आणि वर्षा ऋतूत त्या डोंगरावर उतरलेलं सावळं आभाळ जाणवायचं.

श्रावणातल्या ऊन पावसाच्या वेळी आकाशात उमटलेलं सप्तरंगी इंद्रधनुष्य मात्र आम्ही डोळा भरून पाहायचो. लहानपणी आम्हाला श्रावण भेटायचा तो तोंडपाठ केलेल्या बालकवी, बा. भ. बोरकर, पाडगावकर यांच्या कवितांतून. नाही म्हणायला काही घरांच्या खिडकीच्या पडदीवर कुंडीत, किंवा डालडाच्या पत्र्याच्या डब्यात हौशीने लावलेली झाडं असायची. त्यात विशेष करून झिपरी, झेंडू, सदाफुली, तुळस, कोरफड, मायाळू क्वचित कुणाकडे गावठी गुलाबाच्या झाडावर गुलाब फुललेले असायचे. गल्लीतलं सारं सृष्टी सौंदर्य हे अशा खिडकीत, ओसरीवर पसरलेलं असायचं. ज्या घरांना परसदार होतं त्या परसदारी अळूची पानं, कर्दळ, गवती चहाची हिरवळ जोपासलेली असायची पण मुल्हेरकरांच्या परसदारी मात्र मोठं सोनचाफ्याचं झाड होतं ते मात्र श्रावणात नखशिखान्त बहरायचं त्या सोनचाफ्याचा सुगंध सर्वत्र गल्लीत दरवळयचा. या दरवळणाऱ्या सुगंधात आमचा श्रावण अडकलेला असायचा. या सुवर्ण चंपकाच्या सुगंधात आजही मला बालपणीचा श्रावण कडकडून भेटतो.

श्रावणातील रेशीमधारात मात्र आम्ही सवंगडी मनसोक्त भिजलोय. “ये ग ये ग सरी माझे मडके भरी” नाहीतर “येरे येरे पावसा तुला देतो पैसा ” ही धम्माल बडबड गीतं पावसाच्या थेंबांना ओंजळीत घेऊन उड्या मारत गायली आहेत. गल्लीतले रस्तेही तेव्हा मातीचे होते. पावसात नुसता चिखलच व्हायचा. चिखलाचं पाणी अंगावर उडायचं. खड्ड्यात साचलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडतानाचा तो बालानंद अनुभवला. श्रावणातली हिरवळ आमच्या मनाच्या कोपऱ्याकोपऱ्यात अशा रितीने बहरायची. आमच्या मनातला श्रावणच पाचूचं बन होऊन उतरायचा. एकीकडे ऊन आणि एकीकडे पाऊस.. “आला रे आला पाऊस नागडा” करत मस्त भिजायचे.
संस्कार, परंपरा, त्यातली धार्मिकता, श्रद्धा, त्यामागचं विज्ञान, हवामान, ऋतुमान, विचारधारा या सर्वांचा विचार करण्याचं आमचं वयच नव्हतं. श्रावणातले सगळे विधी, सण सोहळे, पूजाअर्चा, व्रतं, उपवास हे आमच्यासाठी केवळ आनंदाचे संकेत होते आणि गल्लीत प्रत्येकाच्या घरी कमी अधिक प्रमाणात ते साजरे व्हायचेच.

माझे वडील निरीश्वरवादी होते असं मी कधीच म्हणणार नाही पण आमच्या कुटुंबात काही साजरं करण्यामागे कुठलाही कर्मठपणा नसायचा, सक्ती नसायची पण श्रावण महिना आणि त्यात येणारे बहुतेक सर्व सण आमच्या घरात आनंदाने साजरे व्हायचे. आज हे सगळं आठवत असताना माझ्या मनात विचार येतो की अत्यंत लिबरल, मुक्त विचारांच्या कुटुंबात, कुठल्याही कठीण नियमांना बिनदिक्कत, जमेल त्याप्रमाणे अथवा सोयीप्रमाणे फाटे फोडू शकणाऱ्या आमच्या कुटुंबात श्रावण महिन्याचं त्या अनुषंगाने येणाऱ्या रितीभातींचं उत्साहात स्वागत असायचं आणि या पाठीमागे आता जाणवते की त्यामागे होतं पप्पांचं प्रचंड निसर्ग प्रेम ! निसर्गातल्या सौंदर्याचा रसिकतेने घेतलेला आस्वाद आणि जीवन वाहतं रहावं म्हणून केलेला तो एक कृतीपट होता. धार्मिकतेचं एक निराळं तत्त्व, श्रद्धेच्या पाठीमागे असलेला एक निराळा अर्थ आमच्या मनावर कळत नकळत याद्वारे बिंबवला गेला असेल आणि म्हणूनच आम्ही परंपरेत अडकलो नाही पण परंपरेच्या साजरेपणात नक्कीच रमलो. तेव्हाही आणि आताही.

श्रावण महिन्यात घरी आणलेला तो हिरवागार भाजीपाला.. त्या रानभाज्या, ती रानफळे, हिरवीगार कर्टुली, शेवळं, भुईफोडं, मेणी काकडी, पांढरे जाम, बटाट्यासारखी दिसणारी अळू नावाची वेगळ्याच चवीची, जिभेला झणझणी आणणारी पण तरीही खावीशी वाटणारी अशी फळे, राजेळी केळी, केवड्याचे तुरे या साऱ्यांचा घरभर एक मिश्र सुगंध भरलेला असायचा. तो सुगंध आजही माझ्या गात्रांत पांघरलेला आहे.

श्रावण महिन्यातले उत्सुकतेचे वार म्हणजे श्रावणी शनिवार आणि श्रावणी सोमवार. श्रावणी सोमवारी शाळा ही अर्धा दिवस असायची. सकाळच्या सत्रात उपास म्हणून चविष्ट, खवलेला ओला नारळ, कोथिंबीर, लिंबू पिळलेली साबुदाण्याची खिचडी आणि संध्याकाळचे सूर्यास्ताच्या थोडं आधी केलेलं भोजन. शनिवारचा आणि सोमवारचा जेवणाचा मेनूही ठरलेला असायचा. सोवळ्यात चारी ठाव स्वयंपाक रांधायचा. त्या स्वयंपाकासाठी आईने आणि आजीने घेतलेली मेहनत, धावपळ आता जाणवते.

शनिवारी वालाचं बिरडं, अळूच्या वड्या, पंचामृत, अजिबात मीठ न घालता केलेली पिवळ्या रंगाची मूग डाळीची आळणी खिचडी आणि पांढरे शुभ्र पाकळीदार ओल्या नारळाच्या चवीचे गरमागरम मोदक, शिवाय लोणचं, पापड, काकडीची पचडी हे डाव्या बाजूचे पदार्थ असायचे आणि त्या दिवशीचं वैशिष्ट्य म्हणजे हिरव्यागार केळीच्या पानावर मांडलेला हा पाकशृंगार. सभोवती रांगोळी आणि मधल्या घरात ओळीने पाट मांडून त्यावर बसून केलेलं ते सुग्रास भोजन! पप्पाही ऑफिसमधून लवकर घरी यायचे. ते आले की आम्ही सगळे एकत्र जेवायला बसायचो, उदबत्तीच्या सुगंधात आणि वदनी कवळ घेताच्या प्रार्थनेत आमचं भोजन सुरू व्हायचं. आई आणि जीजी भरभरून वाढायच्या. त्या वाढण्यात भरभरून माया असायची. तसं आमचं घर काही फार मोठं नव्हतं पण झेंडूच्या फुलांनी सजलेला देव्हारा आणि भिंतीवर आणि चुलीमागे तांदळाच्या ओल्या पीठाने काढलेल्या चित्रांनी आमचं घर मंदिर व्हायचं. पप्पा आम्हाला जेवताना सुरस कहाण्या सांगायचे. एका आनंददायी वातावरणात जठर आणि मन दोन्ही तृप्त व्हायचं.

श्रावणी सोमवारही असाच सुगंधी आणि रुचकर असायचा. त्यादिवशी हमखास भिजवून सोललेल्या मुगाचे बिर्ड असायचे. नारळाच्या दुधात गूळ घालून गरमागरम तांदळाच्या शेवया खायच्या, कधीकधी नारळ घालून केलेली साजूक तुपातली भरली केळी असायची आणि त्या दिवशी जेवणासाठी केळीच्या पानाऐवजी दिंडीचं मोठं हिरवगार, गोलाकार पान असायचं. या हिरव्या पानात आमचा श्रावण आणि श्रावण मासातल्या त्या पारंपरिक पदार्थांचा सुगंध भरलेला असायचा. विविध पदार्थांचा आणि विविध फुलांचा सुगंध ! आणि या सगळ्या उत्सवा मागे कसली सक्ती नव्हती, परंपरेचं दडपण नव्हतं.. मनानं आतून काहीतरी सांगितलेलं असायचं म्हणून त्याचं हे उत्साही रूप असायचं. आमच्या जडण घडणीच्या काळात या परंपरेने आम्हाला जगण्यातला आनंद कसा टिकवावा हे मात्र नक्कीच शिकवलं. या इथे मला आताही— आमच्या वेळेचं आणि आत्ताचं— कालच आणि आजचं याची कुठेही तुलना करायची नाही. फक्त या आज मध्ये माझ्या कालच्या आनंददायी आठवणी दडलेल्या आहेत हे मात्र नक्की.

नागपंचमीला गल्लीत गारुडी टोपलीत नाग घेऊन यायचा. आम्ही सगळी मुलं त्या भोवती गोळा व्हायचो. गारुडीने पुंगी वाजवली की टोपलीतून नाग फणा काढून बाहेर यायचा. छान डोलायचा. मध्येच गारुडी त्याच्या फण्यावर टपली मारायचा. गल्लीतल्या आयाबाया नागाची पूजा करायच्या. एकाच वेळी मला भीती आणि त्या गारुड्याचं खूपच कौतुक वाटायचं.

जन्माष्टमीला आई देव्हाऱ्यातला एक लहानसा चांदीचा पाळणा सजवायची आणि त्यात सॅटीनच्या पिवळ्या आणि जांभळ्या रंगाची वस्त्रं घातलेला लंगडा बाळकृष्ण ठेवायची. यथार्थ पूजा झाल्यानंतर आई सोबत आम्ही,

श्रावण अष्टमीला देवकी पोटी
आठवा पुत्र जन्माला आला
छकुला सोनुला तो नंदलाला
जो बाळा जो जो जो जो रे कृष्णा…

असे गीतही म्हणायचो. त्यानंतर लोणी, दहीपोह्याचा, डाळिंबाचे लाल दाणे पेरून केलेला सुंदर दिसणारा आणि असणाराही प्रसाद मनसोक्त खायचा. एखाद्या जन्माष्टमीला आम्ही कुणाकडे होणाऱ्या संगीत मैफलीलाही हजर राहिलो आहोत. रात्रभर जागरण करून ऐकलेलं ते भारतीय शास्त्रीय संगीत कळत नसलं तरी कानांना गोड वाटायचं. ताई आणि पप्पा मात्र या मैफलीत मनापासून रंगून जायचे.

मंगळागौरीच्या खेळांची मजा तर औरच असायची. कुणाच्या मावशीची, मोठ्या बहिणीची अथवा नात्यातल्या कुणाची मंगळागौर असायची. फुलापानात सजवलेली गौर, शंकराची बनवलेली पिंडी, दाखवलेला नैवेद्य, सारंच इतकं साजीरं वाटायचं !
नाच ग घुमा कशी मी नाचू
अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई
एक लिंबं झेलू बाई 

अशा प्रकारची अनेक लोकगीतं आणि झिम्मा, फुगड्या, बस फुगड्या, जातं, गाठोडं असे कितीतरी खेळ रात्रभर चालायचे. मंगळागौरीच्या आरतीने समारोप झाला की झोपाळलेले डोळे घेऊन पहाटेच्या अंधारात घरी परतायचे. या साऱ्यांमध्ये एक महान आनंद काठोकाठ भरलेला होता.

दहीकाल्याच्या दिवशी टेंभी नाक्यावरची सावंतांची उंच टांगलेली दहीहंडी बघायला आमचा सारा घोळका पावसात भिजत जायचा. यावर्षी कोण हंडी फोडणार ही उत्सुकता तेव्हाही असायची पण पैसा आणि राजकारण याचा स्पर्श मात्र तेव्हा झालेला नव्हता.

राखी पौर्णिमेला तर मज्जाच यायची. बहीण भावांचा हा प्रेमळ सण आम्ही घरोघरी पहायचो पण आम्हाला भाऊ नाही याची खंत वाटू नये म्हणून स्टेशनरोडवर राहणारी आमची आते भावंडं आवर्जून आमच्या घरी राखी बांधून घ्यायला येत. गल्लीतल्याच आमच्या मित्रांनाही आम्ही राख्या बांधलेल्या आहेत. मी तर हट्टाने पप्पांनाच राखी बांधायची. भावाने बहिणीचे रक्षण करावे म्हणूनच ना राखी बांधायची मग आमच्या जीवनात आमचं रक्षण करणारे आमचे बलदंड वडीलच नव्हते का? त्या अर्थाने ते दीर्घायुषी व्हावेत म्हणून मी त्यांना राखी बांधायची. माझ्यासाठी मी रक्षाबंधनाला दिलेला हा एक नवीन अर्थ होता असे समजावे वाटल्यास.. याच नारळी पौर्णिमेला आम्ही सारे जण कळव्याच्या खाडीवर जायचो. खाडीला पूर आलेला असायचा. समस्त कोळी समाज तिकडे जमलेला असायचा. घट्ट गुडघ्यापर्यंत नेसलेलं रंगीत लुगडं, अंगभर सोन्याचे दागिने आणि केसात माळलेला केवडा घालून मिरवणाऱ्या त्या कोळणी आजही माझ्या नजरेसमोर आहेत.

समिंदराला उधाण आलंय
सुसाट सुटलाय वारा
धोक्याचा दिला इशारा
नाखवा जाऊ नको तू दर्याच्या घरा..

अशी गाणी गात, ठेक्यात चाललेली त्यांची नृत्यं पाहायला खूपच मजा यायची. आम्ही खाडीत नारळ, तांब्याचा पैसा टाकून त्या जलाशयाची पूजा करायचो आणि एक सुखद अनुभव घेऊन घरी यायचो. घरी सुगंधी केशरी नारळी भात तयारच असायचा. तेव्हा जाणवलं नसेल कदाचित पण या निसर्गपूजेने आम्हाला नेहमीच निसर्गाजवळ ठेवलं असावं.
श्रावणातला शेवटचा दिवस म्हणजे पिठोरी अमावस्या. दिवे अमावस्यानंतर श्रावण सुरू होतो आणि पिठोरी अमावस्येला तो संपतो. अंधाराकडून प्रकाशाकडे— हेच ते तत्त्व. तो असतो मातृदिन.

आमची आई देवापाशी बसून डोक्यावर हिरव्या पानात केळीचे पाच पेटते दिवे घेऊन आम्हाला विचारायची, “अतित कोण?”

मग आम्ही म्हणायचो, “मी”

असं आई चार वेळा म्हणायची आणि पाचव्या वेळी विचारायची, “सर्वातित कोण ?”

तेव्हाही आम्ही म्हणायचो, “मी”

काय गंमत असायची ! माय लेकीतल्या या तीन शब्दांच्या संवादाने आम्हाला जीवनात एकमेकांसाठी कायमस्वरूपी प्रेम आणि सुरक्षितताच बहाल केली जणू.

सर्वात हृद्य सोहळा असायचा तो माझी आजी डोक्यावर दिवा घेऊन पप्पांना विचारायची “अतित कोण?” तेव्हांचा. सोळाव्या वर्षापासून वैधव्यात काढलेल्या तिच्या उभ्या जन्माची एकमेव काठी म्हणजे आमचे पप्पा. आईच्या हातून दिवा घेताना पप्पांचे तेजस्वी डोळे पाणावलेले असायचे. तिच्या सावळ्या, कृश, कायेला त्यांच्या बलदंड हाताने मीठी मारून ते म्हणायचे,

“सर्वातित मीच”

या सर्वातित मधला श्रावण मी कसा विसरेन आणि कां विसरू ?

क्रमशः भाग अकरावा 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तांदळाचे दगाबाज मोदक – लेखिका : सुश्री अमृता खंडेराव ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆

सौ.अस्मिता इनामदार

⭐ मनमंजुषेतून ⭐

☆ तांदळाचे दगाबाज मोदक – लेखिका : सुश्री अमृता खंडेराव ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆

आत्तापर्यंत 1760 रीळं पाहून आणि शंभर रेसिप्या वाचून उकडीचे मोदक म्हणजे हातचा मळ वाटू लागले. मग डी मार्टमधून तांदळाचं पीठ आणलं. उकळत्या पाण्यात चमचाभर गावरान तूप आणि मीठ घातलं. चमच्याने हलवून तांदळाचं पीठ कालवलं. झाकून ठेवलं. कोमट झाल्यावर परातीत काढून हाताने मळलं. गोळ्यावर पातेलं पालथं घालून ठेवलं.

नारळ फोडण्याचे विविध विधी.

आधी नारळाच्या सगळ्या शेंड्या काढून त्याखाली त्याचे जे दोन डोळे आणि ओठ असतात ते मोकळे केले. नारळाच्या तोंडात सुरी घालून गोल फिरवली. नारळाचं पाणी चहाच्या गाळणीने पातेल्यात गाळून घेतलं. मग ओट्यावर नारळ धरून लाटण्यानं मारलं. मग बाल्कनीच्या कठड्याच्या भिंतीवर नारळाला आपटलं. मग जाड्या कडप्प्यावर धरून आपटलं. मग जिना उतरून खाली गेले आणि पेवमेंट ब्लॉकवर नारळ ठेवून वरून दगडाने ठोकलं.

हातोडी, दगड, उलथने, सुरी, लाटणे सर्व हत्यारांच्या मदतीने नारळाचे सविस्तर विच्छेदन केले. मग कुणीतरी सांगितल्यानुसार खोबरे सहजपणे निघावे म्हणून नारळाचे तुकडे गॅसवर ठेवले.

करवंटीवरचे उरलेसुरले धागे जळू लागले आणि चमत्कारिक वास सुटला. भयंकर हिंसाचारानंतर नारळाचे तुकडे ताटात पडले.

माझ्याकडे नारळाची खोवणी नाही. खोवणी हा शब्द मला खोबणी या शब्दासारखा वाटतो. आणि मला डोळ्याच्या खोबणीत सुरी घालायची भीती वाटते; त्यामुळे मी ती खरेदी करत नाही

त्यामुळे चाकूने नारळाच्या पाठीवरचे कडक सालटे सोलून काढले. मग ते गुळगुळीत पांढरे खोबरे किसणीवर बारीक किसून घेतले. त्यात गूळ, विलायचीचा चुरा, जायफळाचा किस घालून जाड बुडाच्या कढईत शिजवले.

त्यानंतर पातेल्याखाली दडवलेला पांढरा गोळा बाहेर काढला. हाताला तूप लावून त्यातला छोटा गोळा घेतला. तो हातावर थापतानाच कडेने फाटू लागला. त्याला मऊ पण यावा म्हणून त्यात दूध आणि साय घातली. तर ते जास्तच पातळ झालं. लाटता लाटता तुटू लागलं. मग ते विसविशित, भुसभुशीत द्रव्य हातावर धरून थापटून थापटून चपटं केलं. मध्यभागी दाबून त्याच्यात नारळाचे सारण भरावे म्हणून चमचा सारणाच्या कढईत घातला तर सारण दगडासारखे कडक होऊन बसले होते.

मग हातातली पुरी बाजूला ठेवून सारणात दूध आणि साय घातली. पुन्हा एकदा गॅसवर ठेवून हलवा-हलवी सुरू केली. सारण पातळ दिसू लागलं. मग त्यावर बाजारातून आणलेला खोबऱ्याचा चुरा टाकला. पुन्हा एकदा हलवून घेतलं. थोडं मऊ झाल्यानंतर एका चमच्याने ते पुरीवर ठेवले. पण ते गरम असल्यामुळे पुरी चिकटली नाही. कडक सारणामुळे ती फुटू लागली. काही केल्या सारण आणि पारी एकत्र नांदायला तयार होईनात.

एका बाईप्रमाणे मोदकाला कळ्या पाडण्याचा प्रयत्न करू लागले. पण कळ्या तुटून हातात येऊ लागल्या. आता या कळ्यांचा हार करून गणपतीच्या गळ्यात घालावा की काय असे वाटू लागले. मोदकाची पारी लाटेपर्यंत सारण पुन्हा-पुन्हा कडक होऊ लागले. मला वस्तूच्या आकाराचा मोह नाही पण वस्तूला कुठलातरी एक आकार तर दिला पाहिजे की नाही…. पण मोदक कुठलाच आकार धरायला तयार होत नव्हते.

आता पारीच पाहू का सारणाचं पाहू…. असं करता करता “एक तरफ उसका घर एक तरफ मैकदा… ” अशी अवस्था झाली. मग गमे जिंदगीतून सुटका मिळवण्यासाठी मी एका ताटाला तूप लावलं. आणि पुन्हा एकदा सारण गरम करून पटकन ताटात ओतलं आणि बाळाला झोपवण्यासाठी घाई-घाईने थोपटावं तसं थापलं. सुरेख नारळी वड्या तयार झाल्या. पांढऱ्या पिठाच्या पातळ पातळ भाकरी थापून भाजल्या. अशाप्रकारे भाकरी आणि नारळी वड्या असे दोन उपपदार्थ तयार झाले.

ज्या बायका कळीदार मोदक तयार करतात त्यांनी छान छान व्हिडिओ टाकून आम्हाला नादी लावू नये ही नम्र विनंती. तुम्ही तुमच्या घरात करून खा की. आम्हाला का मनस्ताप मोगरा जाई जुई च्या कळ्यांचा गजरा करून डोक्यात घालावा हार करून गणपतीच्या गळ्यात घालावा पण शहाण्या बाईने मोदकाच्या कळ्यांच्या नादी लागू नये.

लेखिका : सुश्री अमृता खंडेराव.

संग्रहिका – सौ अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सुखाची जत्रा…” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

? मनमंजुषेतून ?

☆ “सुखाची जत्रा…” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

गोष्ट मे महिन्यातील आहे. रविवारचा दिवस होता. सकाळी सकाळी नऊ वाजता बायकोला घेऊन भाजी आणायला गावात चाललो होतो. मोटारसायकलवर आम्ही निघालो होतो… आणि हिने मागून बडबड सुरु केली.

“जरा जीवाला चैन नाही माझ्या. जरा जरा म्हणून काही चव नाही आयुष्यात. नुसतं घर घर करून जीव आंबून चाललाय.” 

मी गाडी थांबवून म्हणलं “काय झालं सकाळी सकाळी. का चिडली आहेस.?”.. तर हिचे डोळे भरलेले.

मी परत विचारलं, “ बोल काय हवंय तुला.. ?” भेळ पाणीपुरी तिला आवडतं. म्हणलं “ खायची का भेळ.. ?” तर म्हणाली “हितं खाऊन काय करू.. ?” 

मी म्हणलं “ मग कुठ खायची आता..? “ 

तर म्हणली, “ पुण्याच्या सारसबागेत नवऱ्यासोबत भेळ खायची माझी लै इच्छा होती आयुष्यात. पण तुम्ही सतत कार्यक्रमात. सतत चळवळीत. आता पोरं पण मोठी व्हायला लागली. सगळा रंगच गेला माझ्या आयुष्यातला. चला वांगी घेऊ भरलेली वांगी करते.”

मी किक मारली. गाडी सुरू केली. ती मागे बसलेली होती. गाडी सरळ एस. टी. स्टँडवर आणली. पार्किंगमध्ये गाडी लावली. तसं ही म्हणाली, “ इकडं कशाला आणलं.?” मी शांतपणे म्हणलं “आता काहीच बोलू नकोस. माझ्या सोबत शांतपणे चल. ” पोरं घरात होती. त्यांना सुट्ट्या सुरू होत्या. आई वडील असल्यामुळे पोरांची चिंता नव्हती.

समोर कवठेमहांकाळ ते स्वारगेट ही साडेनऊची एस. टी. उभी होती. मी हिचा हात धरला आणि थेट एस. टी. त बसलो. ही लागली ओरडायला. “ काय चाललंय हे. मूर्खपणा नुसता. चला घरी. ”

त्यावर मी म्हणलं, “ आज काही झालं तरी सारसबागेतच तुला भेळ खायला घालणार. ” 

त्यावर ती घाबरली. आणि गाडीतून झटकन खाली उतरली. मी पळत खाली उतरून तिचा हात धरला. म्हणलं “हे बघ घरात काही अडचण नाही. आई आण्णा आहेत पोरांजवळ. मी सांगतो त्यांना काय असेल ते. तू शांत रहा “.. खूप विनवण्या करून तिला गाडीत आणून बसवलं.

घरी आईला फोन करून आईला जे काही सांगायचं ते सांगितलं. स्वारगेट चे तिकीट काढले. प्रवास सुरू झाला. सायंकाळी पाच वाजता आम्ही सारसबागेत होतो. हातात भेळ होती. मी तिला भरवत होतो. तिथं बसलेल्या एका कॉलेजच्या पोराला आमचा फोटू काढायला लावला. मी तिला हाताने भेळ भरवली. एक तास थांबलो. परत काही काळ पुण्यात चालत हिंडलो. रात्रीचं जेवण केलं. आणि रात्री अकराच्या गाडीने माघारी निघालो. ते दुसऱ्या दिवशी सकाळी कवठेमहांकाळ.

बिचारी पार थकून सुकून गेली होती. पण खुलून आणि उजळून निघाली होती. तिची मागणी फार मोठी नव्हती. फक्त ठिकाण आणि अंतर तीनशे किलोमीटर वर दूर होतं. मी फक्त मनाची तयारी करून ते अंतर आमच्या ओंजळीत भरलेलं होतं. कधी कधी संसारात असा वेडेपणा केल्याशिवाय घराच्या उंबरठयावर सुखाची जत्रा भरत नसते.

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ श्रावणसरी… – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ श्रावणसरी… – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे

(ज्यांनी आपल्या आई-वडिलांना असं रस्त्यावर सोडलं आहे, त्यांच्या आयुष्यात येईल का हा पश्चातापाचा दिवस ? … करतील का ते कधी आत्मपरीक्षण ?? … देतील का ते कधी कबुली जबाब स्वतःला ??? 

… येईल का त्यांच्याही आयुष्यात “पतेती”…??? मी त्या नववर्षाची वाट पाहत आहे… !!!) – इथून पुढे 

…कॅलेंडर प्रमाणे पारशी नववर्ष सुरू झाले… तो दिवस होता 15 ऑगस्ट ! 

15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन ! 

वर्दीमधली माणसं जेव्हा देशासाठी शहीद होतात, तेव्हा त्यांच्याभोवती तिरंगा गुंडाळला जातो…!

हा सन्मान मिळायला तेव्हढं भाग्य असावं लागतं….! 

तरीही त्यापुढे जाऊन मी धाडसाने म्हणेन… देशभक्ती करायला फक्त वर्दीची गरज नसते…

ज्याला जे काम नेमून दिलं आहे, त्यांनं ते प्रामाणिकपणे करणं म्हणजे देशभक्ती… ! 

….. विद्यार्थ्याने गुरुजन आणि आई-वडिलांचे ऐकून शिक्षण घेणे आणि त्या शिक्षणाचा उपयोग देशाच्या भल्यासाठी करणे म्हणजे देशभक्ती !

….. डॉक्टरने, रुग्णसेवेला महत्त्व देऊन… Allopathy, Homeopathy, Naturopathy यासोबतच Sympathy आणि Empathy या पॅथींचाही वापर करणे म्हणजे देशभक्ती ! 

….. इतर कोणत्याही सरकारी / खाजगी सेवेत असलेले अधिकारी, कर्मचारी, सेवक या सर्वांचे बाबतीत सुद्धा हेच सांगता येईल…. !

….. रस्त्यावर न थुंकणे म्हणजे देशभक्ती…

….. चिरीमिरी न घेणे म्हणजे देशभक्ती…

….. मुली महिलांचा आदर करणे म्हणजे देशभक्ती…

….. आपल्याला जे नेमून दिलेलं काम आहे, ते मनोभावे करणं म्हणजे देशभक्ती….

अशा प्रकारची देशभक्ती केली तर, अंगावर घातलेलं कुठलंही वस्त्र, हे मग युनिफॉर्मच होईल ! 

वर्दी / युनिफॉर्म…. ही अंगावर घालायची गोष्टच नाही मुळी….. ती मनात घेऊन मिरवायची गोष्ट आहे… ! 

… फक्त दहा ते पाच नाही…. जन्मलेल्या तारखेपासून, मृत्यू होईपर्यंत सांभाळायची ती गोष्ट आहे… ! 

पूर्वी भीक मागणाऱ्या परंतु आता, शाळेत जाणाऱ्या अनेक मुलांना या महिन्यात आपण युनिफॉर्म घेऊन दिले आहेत…. शाळेच्या फिया भरल्या आहेत… ! 

उद्या हीच मुलं मोठी होतील…. पुढे इतर कोणत्याही क्षेत्रात जातील, देशाची भक्ती करतील….

आणि म्हणून, याच मुलांना, “भारत” समजून, युनिफॉर्ममधल्या पोरांकडे पाहून मी त्यांना कडक सॅल्यूट ठोकला…. जय हिंद… वंदे मातरम… असं म्हणत मग आम्ही झेंडावंदन केलं.. !!! 

आधार हरवलेली… अंधारात चाचपडणारी ही माणसं, जेव्हा स्वयंपूर्ण होऊन… स्वतःच प्रकाशित होतात, तो क्षण पौर्णिमेचा ! आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि मदतीने माझी अनेक माणसं या महिन्यात “प्रकाशित” झाली…. कदाचित यांच्याच प्रकाशाने रात्र उजळली… आणि मग 15 ऑगस्ट नंतर, श्रावणातली पौर्णिमा उगवली…

आली पौर्णिमा आली…. अल्लड, अवखळ धाकली बहीण म्हणून धावत आली, हातात राखीचे बंधन घेवून आली… रक्षाबंधन… !!! 

… रस्त्यावरील शेकडो आजी आणि ताईंनी मला राख्या बांधल्या. “जगात ज्याला जास्त बहिणी, तो खरा श्रीमंत”, अशी श्रीमंतीची व्याख्या ठरली; तर आज सगळ्या जगातला मीच एक श्रीमंत ! 

सर्वात श्रीमंत मीच असलो तरीही एका टप्प्यावर याचक सुद्धा मीच आहे….. इतक्या साऱ्या बहिणींना मी ओवाळणी तरी काय देऊ ? माझी पात्रता ती काय ? 

…. मग, कमरेत वाकलेल्या आजीला कमरेचा पट्टा देवून तिचा आधार झालो…

…. गुडघ्याच्या त्रासामुळे चालता येईना, त्या आजीला गुडघ्याचा पट्टा बांधून देवून, तीचा गुडघाच झालो…

…. आधाराशिवाय उभेच राहता येत नाही, अशा आजीला हातात काठी देऊन तीची काठीही झालो…

…. डोळ्याला दिसत नाही ? मग ऑपरेशन करून तिचा नेत्र झालो…

सुकलेल्या, वाळलेल्या, वठलेल्या झाडांवर पुन्हा पालवी फुटत नाही असं म्हणतात…

आईशपथ सांगतो, मी या झाडांवर त्या दिवशी हिरवीगार नाजूक पालवी उमललेली पाहिली आहे… ! 

हसताना यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या मला, समुद्रातल्या एका संथ पण फेसाळलेल्या लाटेसारख्या भासतात… ! 

… रक्षाबंधनाच्या दिवशी, मी ही संथ लाट झालो… त्यांच्या काळजावर पडलेली मी एक छोटीशी सुरकुतीच झालो…. ! 

“नारळी भात” आमच्या नशिबात नसला, तरी अनेक याचकांना, कामाला लावून त्यांच्याकडून, जेवणाचे डबे तयार करून घेऊन; रस्त्यावरील गोरगरिबांना आणि हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणाऱ्या याचकांना आमच्या “अन्नपूर्णा प्रकल्पाच्या” माध्यमातून देत आहोत.

त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून जाणीव झाली, श्रावण मास आत्ता चालू झाला गड्या…. !

… पण, हरलेल्या या चेहऱ्यांकडे पाहून मग माझ्या तोंडून शब्द निघाले…

श्रावणमासी हर्ष नसू दे

नसू दे हिरवळ चोहीकडे

सरसर शिरवे, भिऊ नको तू

आपोआप ते ऊन पडे

*

झालासा तो वाटतो सूर्यास्त

सूर्याला रे, अंत नाही गडे

तूच सूर्य हो, तूच प्रकाश हो

हो तू रे गरुड राजा, जो आकाशाशीं भिडे

(आदरणीय बालकवींची माफी मागून)

श्रावणातल्या पौर्णिमेचा चंद्र मनामध्ये जागा ठेवत, मग “श्रीकृष्ण जयंती” आली.

जे भिक्षेकरी; भीक मागणे सोडून देऊन काम करायला लागले आहेत; त्यांचा नवीन जन्म झाला असंच मला वाटतं…. माझ्यासाठी मग हेच बाळकृष्ण ! 

माझेच काही याचक लोक; आम्ही भिक्षेकरी (भिकारी) हाय, अजूनही असं काही वेळा उघडपणे सांगतात… मला त्यावेळी वाईट वाटतं… ! 

पण ज्या भिक्षेकर्‍यांनी भीक मागणं सोडून दिलं आहे; असे माझे “बाळकृष्ण” मग हा “कंस” फोडतात… तोडतात… भेदतात…

कंसातल्या भिकारी या शब्दाचा वध करून, स्वतःच तयार केलेल्या “बंदीशाळेतून” जेव्हा “गावकरी” म्हणून जन्माला येतात, तोच माझ्यासाठी जयंती सोहळा असतो… ! 

आम्ही दहीहंडी सुद्धा मांडली….. नव्हे रोज मांडत आहोत…

…. आमची दहीहंडी तीनच थरांची… भिक्षेकरी – कष्टकरी – गावकरी

तीनच थर आहेत, त्यामुळे वरवर दिसायला सोपी दिसते पण फोडायला त्याहून अवघड… ! 

ही दहीहंडी फोडायला आपण सर्वजण आम्हाला प्रोत्साहन देत आहात, पाठीमागून टेकू देऊन वरवर ढकलत आहात, सर्वतोपरी मदत करत आहात…. आम्ही ऋणी आहोत आपले ! 

आता आपल्याकडून एक वचन हवे आहे…..

‘आपण सर्वांनी भिक मागणाऱ्या व्यक्तीला भीक देणे बंद करूया… स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्याला मदत करूया… ! ‘ 

भीक आणि मदत या दोन शब्दामध्ये खूप फरक आहे….. आपल्या काहीही देण्यामुळे समोरची व्यक्ती जर परावलंबी होत असेल तर ती भीक….. पण, आपल्या कोणत्याही देण्यामुळे समोरची व्यक्ती जर स्वावलंबी होत असेल तर ती मदत ! …. पुण्य कमावण्याच्या नादात भीक देऊन एखाद्याला खड्ड्यात ढकलण्यापेक्षा, स्वावलंबी होण्यासाठी मदतीचा हात पुढे करून त्याला खड्ड्यातून बाहेर काढूया…

तरच ही तीन थरांची, दहीहंडी खऱ्या अर्थाने फुटेल… !!! 

जेव्हा ही दहीहंडी कायमची फुटेल, त्यावेळी मी रस्त्यावर येऊन जल्लोष करेन… नाचेन… गाईन आणि म्हणेन…. गोविंदा आला रे…. आला…. ! 

– समाप्त –  

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ श्रावणसरी… – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ श्रावणसरी… – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे

या महिन्यात बरेच सण येऊन गेले नागपंचमी पतेती, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जयंती, दहीहंडी… वगैरे वगैरे… ! परंतु माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा सण म्हणजे 15 ऑगस्ट ! 

आयुष्याच्या सुरुवातीला भेटलेल्या भीक मागणाऱ्या आजोबांनी मला मदत केली होती, यानंतर मी आंतरराष्ट्रीय संस्थेत काम करत होतो, परंतु या आजोबांसाठी किंवा ज्या समाजाने मला त्यावेळी मदत केली, त्यांच्यासाठी मी काहीच करू शकलो नाही आणि आता त्यांच्यासाठी काहीतरी करावे या भावनेने ; 15 ऑगस्ट 2015 रोजी मी आंतरराष्ट्रीय संस्थेचे राजीनामा देऊन रस्त्यावर आलो.

आज नवव्या वर्षातून दहाव्या वर्षात आम्ही पदार्पण करणार आहोत. मधल्या काळात ज्या घटना घडल्या त्या विषयी 15 ऑगस्ट माझाही स्वातंत्र्य दिन या लेखात स्वतंत्रपणे सर्व काही लिहिले आहे. याचा ऑडिओ मी काही दिवसात आपणास पाठवून देईन.

या नऊ वर्षात 3000 पेक्षाही जास्त स्थानिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.

माझ्या कामावर आणि माझ्यावर लोकांनी इतकं भरभरून प्रेम केलं, आशीर्वाद दिले आणि स्तुती केली… ती क्वचितच एखाद्या माणसाला त्याच्या जिवंतपणी मिळते ! 

हा भाग्यवान मीच आहे… !!!

पण गेल्या नऊ वर्षात मात्र एक शिकलो… स्तुती ही सोन्याच्या अलंकारासारखी असते… अंगभर घातलेले सोन्याचे दागिने एखाद्या सण समारंभात ठराविक वेळी छान दिसतात….

पण ते कितीही छान दिसले आणि मौल्यवान असले; तरी रात्री झोपण्याअगोदर मात्र हे दागिने उतरून ठेवावे लागतात… नाहीतर ते टोचतात… बोचतात !….. स्तुतीचंही तसंच, एखाद्या समारंभात “स्तुती अलंकार” तेवढ्यापुरते घालून मिरवायचे असतातच ; परंतु एका क्षणी ते स्वतःच उतरून सुद्धा ठेवायचे असतात… नाहीतर ते आपल्यालाच टोचतात आणि बोचतात सुद्धा.

सतत हे स्तुती “अलंकार” घालून फिरलं की त्याचा “अहंकार” निर्माण व्हायला सुध्दा वेळ लागत नाही.

आणि मग हा “स्तुती अहंकार”, अलंकार न राहता, आपल्यालाच टोचायला आणि बोचायला लागतो…

तेव्हा तो योग्य वेळी काढणं हेच बरं… ! 

असो…. ! 

तर, जो समाज आपल्याला मदत करत आहे, त्यांच्या प्रती ऋण व्यक्त करावे, त्यांनी दिलेल्या मदतीतून आपण काय दिवे लावले, हे त्यांनाही कळवावे, आपण योग्य रस्त्यावर आहोत का, हे पडताळून पाहावे, चुकत असेन तर सल्ले घ्यावे, आपल्याला जे समाधान मिळत आहे ते सर्वांना थोडेसे वाटावे… गेली नऊ वर्षे दर महिन्यात आपल्याला “लेखाजोखा” सादर करण्याचा फक्त हाच हेतू असतो !

… तर, ऑगस्ट महिना नुकताच सुरू झाला आणि आषाढातली “अमावस्या” समोर आली.

अनेकांची आयुष्यं सुद्धा अशीच असतात. आत्ता कुठे आयुष्य सुरू झालं म्हणता म्हणता, ” भाकरीचा चंद्र “ कुठेतरी हरवून जातो…. काळोख्या त्या रात्रीत भुकेल्या पोटी चाचपडत बसण्याशिवाय दुसरा मग त्यांना कोणताही पर्याय नसतो.

… कोणाचाही आधार नसलेल्या, उजेड हरवून बसलेल्या तीन ताई… यांना या महिन्यात हातगाड्या घेऊन दिल्या, व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल दिले.

… जिच्या डोळ्यातलाच सूर्य हरवला आहे… अशा अंध ताईला रक्षाबंधनाच्या अगोदर राख्या विकायला दिल्या.

… श्वास चालू आहेत म्हणून जिवंत म्हणायचे… असा एक जण रस्त्याकडेला एक्सीडेंट होऊन पडून होता, मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून त्याच्यावर उपचार केले, पूर्ण बरा झाला. निराधारांसाठी चालत असलेल्या एका वृद्धाश्रमामध्ये “सेवक” म्हणून त्याला रुजू करून दिला आहे. वृद्ध निराधार आजी आजोबांची सेवा करत स्वतःचं पोट पाणी आता तो सन्मानाने भरेल.

… अशाच एका मृत म्हणून घोषित झालेल्या युवकाला आपण उचलून आणले… ऍडमिट केले… आमच्या या प्रयत्नाला आशीर्वाद म्हणून निसर्गाने त्याच्यामध्ये “प्राण फुंकले”… पूर्णपणे खडखडीत बरा होऊन, आज तो एका चांगल्या ठिकाणी वॉचमन म्हणून काम करत आहे…

अशा वरील सहा जणांना, या महिन्यात व्यवसाय टाकून दिले आहेत / नोकरी मिळवून दिली आहे, ते आता प्रतिष्ठेने जगू लागले आहेत… ! आपण प्राण कोणाला देऊ शकत नाही; परंतु भीक देणे बंद करून एखाद्याला पायावर उभं राहण्यासाठी मदत करून, प्रतिष्ठा नक्की देऊ शकतो… ! 

प्रतिष्ठा नसेल; तर प्राण काय महत्त्वाचे ? 

अमावस्या सरली म्हणता म्हणता, पतेतीची पहाट उगवली…. पारशी नववर्षाचा आदला दिवस म्हणजे “पतेती”… ! 

पतेती म्हणजे “पश्चात्तापाचा दिवस”… ! 

पतेती म्हणजे केलेल्या चुका मान्य करून “कबुलीजबाब” देण्याचा दिवस… !!

पतेती म्हणजे आत्मनिरीक्षणाचा दिवस… !!! 

शेपूट लपवून, माणूस असल्याचे ढोंग करत समाजात फिरणारी अनेक माकडं मला भेटतात. आपल्या आई-वडिलांना रस्त्यावर सोडून, या फांदीवरून त्या फांदीवर कोलांट उड्या मारत स्वतः मस्त मजेत जगत असतात…. या माकडांनी, अशा रस्त्यावर सोडलेल्या वृद्ध आई-बाबांना आम्ही रस्त्यावरच आंघोळ घालतो, नवीन वस्त्र देतो आणि एखाद्या वृद्धाश्रमामध्ये त्यांना दाखल करतो. जेव्हा या आई-बाबांना आम्ही रस्त्यात आंघोळी घालतो; त्यावेळी आता आम्हाला कुठेही “अभिषेक” करण्याची गरज उरली; असं मला वाटत नाही… ! आमचा अभिषेक तोच… आमची पूजा तीच… ! 

… अशा 75 आई बाबांना आजपर्यंत सुरक्षित स्थळी ठेवले आहे. आयुष्यात अशा 75 पूजा मांडल्या… ! 

जे जगले त्यांचे सून आणि मुलगा झालो…

जे गेले त्यांचे सून आणि मुलगा होऊन अंत्यसंस्कार केले… !

. अशा 75 आई-बाबांना आपण उचलून कुशीत घेऊ शकलो, याचे भाग्य समजू ? 

आनंद मानू ? हे सर्व करण्याची मला संधी मिळाली, यात समाधान मानून हसू ? ….

… की; सुकलेल्या पालापाचोळ्यासारखे कितीतरी वृद्ध आई-वडील अजूनही रस्त्यावर पडून आहेत, याचे दुःख मानू ? 

… कधीतरी सुगंधी असणारे, धगधगते आई बापाचे हे जीव, कापरासारखे वाऱ्याबरोबर उडून जातात… परत कधीही न येण्यासाठी… ! त्यांनी आयुष्यात पाहिलेली स्वप्नं मग, चिते मधल्या अग्नीत जळूनतरी जातात किंवा कायमची जमिनीत दफन तरी होतात… !!! धुरासारखी जळून गेलेली स्वप्नं, मग आकाशातले ढग होतात….. त्या आई-बाबांचे अश्रू आकाशातून कधीतरी असह्य होऊन, धो धो कोसळू लागतात…

आणि घराच्या खिडकीतून आपण डोकावून, कॉफीचा मग हातात घेऊन म्हणतो, ‘ यंदाचा पाऊस जरा जास्तच आहे नाही का ‘… ???

हा… हा.. पाऊस नसतो हो… ! 

पूर नदीला येतंच नाही…. हा पूर असतो गेलेल्या आई बापाच्या डोळ्यातला… ! 

… ज्यांनी आपल्या आई-वडिलांना असं रस्त्यावर सोडलं आहे, त्यांच्या आयुष्यात येईल का हा पश्चातापाचा दिवस ? … करतील का ते कधी आत्मपरीक्षण ?? … देतील का ते कधी कबुली जबाब स्वतःला ??? 

… येईल का त्यांच्याही आयुष्यात “पतेती”… ???

मी त्या नववर्षाची वाट पाहत आहे… !!!

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

(वडीलधारी माणसं आपल्याला पोरकं करून पुढच्या प्रवासाला निघून जातात आणि दुरावतात. त्यांच्यापेक्षा त्यांच्या आठवणीच जास्त जवळच्या वाटतात कारण त्या कायमच आपल्याजवळ राहतात. जुन्या पिढीची आठवणींची शिदोरी नव्या पिढीच्या स्वाधीन करावी म्हणून हा लेखन प्रपंच. ह्या शिदोरीत त्यावेळच्या जुन्या काळच्या पुण्याच्या आठवणींचीही सांगड घातली आहे.)

– माय माझी जोगेश्वरी –

बुधवार पेठेतल्या ग्रामदैवत जोगेश्वरी मातेच्या सान्निध्यात माझ बालपण सरल. पुण्यनगरीत बुधवारपेठेचं महत्व अलौकिक आहे. श्रीमंत दगडु शेट गणपतीच वास्तव्य तिथे आहे तर बालाजी, निवडुंग्या विठोबा, लालमहाल, कसबा गणपती हा मानाचा पहिला गणपती कसब्यात विराजमान झाला आहे. शुभकार्याच्या शुभारंभाला इथूनच सुरवात होते. जवळच दिमाखात उभा असलेला शनिवारवाडा इतिहासाच्या वैभवाची साक्ष देतो. आणि ह्या सगळ्या भाविक, ऐतिहासिक वातावरणांत ‘सकाळ’ (पेपर)ऑफीसने आपला संसार थाटला आहे. ह्या धार्मिक एतिहासिक आणि सामाजिक स्थळांनी युक्त अशा ह्या बुधवारांत माझ माहेर होत. तांबडया जोगेश्वरीचा इतिहास सांगतांना वडिलधारे सांगतात.. ह्या भागांत पूर्वी जंगल होत, आणि त्यांत झुळझूळ वहाणारा झरा होता. त्या झऱ्यातून आई जोगेश्वरी प्रगट झाली. भाविकांनी तिथे छोटसं देऊळ बांधले. आईची प्रतिष्ठापना करण्यात आली. पुढे विस्तार वाढला आणि छोट्या देवळाचं मोठ्या मंदिरात रूपांतर झाल. या घटनेच्या साक्षीदार म्हणून दोन दिपमाळी अजूनही दिमाखात तिथे उभ्या आहेत( एक मोडकळीस आल्यामुळे पडली असावी ) त्रिपुरी पौर्णिमेला शतज्योतींनी दिपमाळी झळाळून जायच्या, चंद्राचं टिपूर चांदणं आणि सोनेरी प्रकाशातल्या त्या दिपज्योती मनाचा कानाकोपरा उजळून टाकायच्या. मनातली काजळकाजोळी लगेचच मिटून जायची. काळ सरलाय. पुला खालून बरचसं पाणी गेलय. झाडाझुडपात निर्मळ, नितळ झऱ्या शेजारी वसलेलं पुणं आता निसर्ग सौंदर्यातून लोप पाऊन सिमेंटच्या जंगलात अडकलय. आमच्याही आयुष्याची संध्याकाळ सुरू झाली आहे, त्या भागात गेलं की जुन्या आठवणी जाग्या होतात. बालपणापासून ते तरुणपणापर्यंतचे सुखाचे ते दिवस, ती जीवाला जीव देणारी, अतोनात प्रेम करणारी आपली माणसं आठवतात. मन मागे मागे भूतकाळात विसावत. आणि चलत चित्रपटासारखे सगळे प्रसंग, ते माहेरच्या अंगणातले क्षण आठवतात. आठवणींचा फेर धरता धरता भोंडल्याच्या गाण्यात शिरलेलं मन गुणगुणायलालागतं “अस्स माहेर सुरेख बाई. ” आणि मग आठवणींचे क्षण वेचतां वेचता मन उधाण उधाण होतं.

पंडू पुत्र विजयी झाले. माता कुंती राजमाता झाली तिच्यासाठी पाचपुत्रांनी भव्य प्रासाद बांधला. तो बांधताना राजमातेने एकच अट घातली होती, ” बाळांनो माझ्यासाठी प्रासाद बांधताना तो इतका उंच बांधा इतका उंच बांधा की प्रासादाच्या सज्जातून मला माझं माहेर दिसलं पाहिजे. ” राजमाता कुंतीच्या माहेरच्या ओढीची ही कथा आहे तर मग आपण तर सामान्य स्रिया आहोत. अर्थात प्रत्येकीला माहेरची ओढ असतेच. मनाचं पांखरू केव्हा उडतं आणि माहेरच्या अंगणात केव्हा विसावत. हे तिच तिलाच कळत नाही. श्रीजोगेश्वरीच्या अगदी समोरच दोन दिपमाळ्यांच्या मधोमध आमचा वाडा होता. मंदिर आणि घर म्हणजे अंगण ओसरीच होती. आपली पिल्लं कुठेही विखुरली असली तरी त्यांच्याकडे कासविण दुरूनही लक्ष ठेवते. तशी ही विश्वदेवता साऱ्या जगावर आपल्या मायेचे पांघरूण घालत असते. आणि कृपादृष्टी ठेवत असते. असं हे आठवणींचं गाठोड मला माय माऊली जोगेश्वरीच्या पायाशी सोडावंसं वाटलं आणि तुमच्यापुढे उलगडावस वाटलं.

श्री जोगेश्वरी माय माऊली अशी आहे की संकटात सांवरतेच पण सुखातील गहिंवर आणते. अशा ह्या श्रीजोगेश्वरी मातेला माझा दंडवत.

– क्रमशः भाग पहिला 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठवणींची बिल्वपत्रे … ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

आठवणींची बिल्वपत्रे … ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

श्रावण महिना आला की आपोआपच श्रावणी सोमवार आठवू लागतात. लहानपणी रत्नागिरीला आम्ही विश्वेश्वराच्या देवळात सोमवारी जात असू. ते देऊळ कॉलेजच्या मागच्या बाजूच्या उतारा खाली होते …. त्यामुळे कॉलेज अर्ध सोडून बरीच मंडळी देवदर्शनासाठी जात असत… श्रावणी सोमवार हा खूप आनंददायी वाटत असे, कारण शाळेला अर्धी सुट्टी! आणि दर सोमवारी उपास सोडायला आई नवनवीन गोड पदार्थ करत असे. अर्धी शाळा सुटली की आम्ही घरी येत असू, तेव्हा स्वयंपाक घरातून छान छान गोड वास येत असे. मग कधी सांजा तर, कधी खीर, कधी रव्याची खांडवी, घावन असे पदार्थ आई उपास सोडायला करत असे.

पुढे मोठं झाल्यावर शिक्षणासाठी सांगलीला राहिले, तेव्हा हरिपूरची श्रावणातली जत्रा हे आनंददायी ठिकाण होते. हॉस्टेलवर राहत असल्यामुळे आमच्याकडे अशा गर्दीच्या ठिकाणी जायला आम्हाला रेक्टर बाई परवानगी देत नसत, पण तरीही कधी गोड बोलून तर कधी बाईंना चुकवून आम्ही हरिपूरच्या जत्रेला जात असू! हरीपुर ला कृष्णा वारणेच्या संगमावर संगमेश्वराचे शंकराचे देऊळ आहे. अतिशय रम्य आणि पवित्र ठिकाण! समोर वाहती नदी, सगळीकडे पसरलेला प्रसन्न हिरवागार परिसर आणि त्यातच हौशे, नवशे आणि गवसे अशा सर्व प्रकारच्या लोकांची गर्दी! म्हणजे देवाला येणारे लोक! तसेच जत्रेला म्हणून येणारे आणि काही असेच छोटी मोठी चोरी मारी करायला येणारे गवसे लोक ही असायचे!

पिपाण्या, शिट्ट्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे आवाज आसमंतात घुमत असत. फुगेवाले, छोट्या मोठ्या वस्तू विकणारे फेरीवाले तिथे फिरत असत. रस्ता अगदी अरुंद होता, दुतर्फा चिंचेचे झाडं होती, वाहनांची, माणसांची खूप गर्दी असे, पण सर्व वातावरण उत्साहाने आनंदाने भरलेले असायचे.. हरीपुरची श्रावण सोमवारची जत्रा अजूनही आठवणींच्या कलशात एक खडा टाकून बसलेली आहे..

पुढे लग्न झाल्यावर श्रावणी सोमवारी शिवामूठ वाहण्यासाठी शंकराला जात असू.. प्रत्येक वेळी माझ्या मनात विचार येई की, हा भोळा शंकर कुठेतरी रानावनात गावापासून दूर असाच राहिलेला असतो ! त्याच्या प्राप्ती साठी पार्वती ने किती व्रतं केली.. कष्ट घेतले. बऱ्याच वेळा शंकराचे ठिकाण नदीच्या काठी किंवा रानावनात च असते…..

नंतर काही वर्षे मुलांच्या संगोपनात गेली आणि या शंकराची दर्शनं थोडी दुर्मिळ झाली! पण अशीच एक खास लक्षात राहिलेली ट्रीप म्हणजे भीमाशंकरची!

पुण्यापासून जवळ असलेले हे ठिकाण पाहायचं राहिलं होतं! भीमाशंकर डोंगराळ भागात असलेलं, फारशा गाड्या नव्हत्या. त्यामुळे जाणं तितकसं सोयीचं नव्हतं, पण एक वर्ष योग जुळून आला. श्रावणामध्ये मी माहेरी आले होते, त्यामुळे दोन्ही भाऊ आणि वहिनी असे आम्ही सर्वजण भीमाशंकर ला जायचे ठरवले. तसं पुण्यापासून हे ठिकाण लांब आहे. इथली आम्हाला काहीच माहिती नव्हती आणि तेव्हा स्पेशल गाडी वगैरे प्रकार नव्हता. सरळ एसटीच्या बससाठी स्टैंड वर आलो. भली मोठी लाईन लागलेली होती, तरीही आज नक्की जायचं असं ठरवून आम्ही रांगेत उभे राहिलो. एकदाची आम्हाला बस मिळाली. भीमाशंकरला उतरलो तेही भर पावसात! बरोबर एखादी छत्री होती आणि पुण्याहून येताना इकडे इतका मोठा पाऊस असेल याची कल्पना नव्हती. स्टँडवर उतरल्यावर प्लास्टिकची इरली विकणारी मुले 

आमच्या भोवती जमा झाली. आम्ही लगेच दोन-तीन इरली विकत घेतली आणि ती डोक्यावर घेऊन रांगेमध्ये बारीक बारीक पडणाऱ्या पावसात उभे राहिलो. हा अनुभव आमच्यासाठी नवाच होता. आसपास बघितलं तर कुठेही हॉटेल वगैरे दिसत नव्हतं! तिथे काही तरी सोय असेल म्हणून आम्ही खाण्यासाठी डबे नेले नव्हते. त्यामुळे देवदर्शन झाल्यानंतर जेवण खाण्याचं काय करायचं हा मोठा प्रश्न वाटत होता!

पण तो विचार मागे टाकून आम्ही प्रथम देवदर्शनासाठी गेलो. वातावरण अर्थातच खूप प्रसन्न होतं! भीमा नदीच्या उगमाचे हे ठिकाण आणि तिथे असणारे शंकराचे वास्तव्य, देवळाच्या मागून भीमेचा उगम बघायला जाणाऱ्यांची गर्दी दिसली. आम्ही सुद्धा त्याच वाटेने वर वर चढत गेलो, पण येणारा पाऊस आणि अंतर या दोन्हीचा विचार करता कधी एकदा उगम पाहतोय आणि खाली येतो असं आम्हाला झालं होतं!

तासभर इकडे तिकडे फिरून झाल्यावर आम्ही परत मंदिरापाशी येऊन बसलो. तितक्यात माझ्या वहिनीच्या ओळखीचे एक जण तिला दिसले आणि शंकराची कृपा इतकी की आम्हाला त्यांनी जेवणासाठी त्यांच्या घरी नेले! तिथे गरम गरम आमटी- भात खाताना खरोखरच मन भरून आलं! जिथे कोणी नाही तिथे परमेश्वर आपला साथीदार असतो याची जाणीव झाली. आपली श्रद्धा पाहिजे एवढे मात्र खरे!

या गोष्टीला सहज 40 वर्ष झाली असतील.. त्यानंतरच्या काळात आम्ही बारा ज्योतिर्लिंगांपैकी जवळपास 11 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतले होते. राहिला तो केदारनाथ! तो योग मात्र आला नाही, पण कसं कोण जाणे, पाटणला असताना तिथे असलेल्या शंकराच्या मंदिराला ‘केदारनाथाचे मंदिर’ म्हणत आणि त्याच्या आशीर्वादाने मला मुलगा झाला. त्याचेही नाव केदार ठेवले आणि नकळतच त्या केदारनाथाचे दर्शन मला झालं असं मला वाटतं.

दर श्रावणातील सोमवारी नकळतच ही शिवदर्शनाची आठवण होते … आणि या श्रावणातही आणखी एक आठवणींचा खडा माझ्या लेखन कलशात टाकला गेला !

जय भोलेनाथ !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “चातुर्मास कहाणी…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “चातुर्मास कहाणी…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

“आज श्रावणी सोमवार आहे मी शंकराच्या मोठ्या देवळात आत्ता जाणार… “

तिनी सुनेला सांगितले.

“अहो आई आत्ता खूप गर्दी असेल.. असं करूया… सोनल शाळेतून आली की आपण दुपारी तीन वाजता जाऊ या तेव्हा गर्दी कमी असेल”

“मला फराळ करायच्या आधी दर्शन घ्यायचे आहे…. “गर्दी असली तरी असू दे… मी जाणार… “

बजावलंच तिनी सुनेला..

 

“जाऊदे सुनबाई ती नाही ऐकणार”

“हो…. नाहीच ऐकणार.. “

….. असं नवऱ्याला सांगत ती निघालीच… ती शेजारच्या मैत्रिणीकडे गेली 

” तू येणार नसशीलच तरी पण विचारते येणार आहेस का शंकराच्या देवळात दर्शनाला ?….. “

“अगं कस ग मला जमणार? सुनबाई दहाला ऑफिसला जाणार. नातं शाळेतून येणार, कामवाली…… “

” दे दे आयुष्यभर तू न येण्याची कारणंच दे “

 

आज ती जरा रागावलीच मैत्रिणीवर… आज एवढा श्रावणी सोमवार आहे हिला काही नाही त्याचं…..

 

निघायला साडेनऊ झाले. रिक्षानी निघाली. रिक्षा दुसऱ्याच रस्त्याला लागलेली बघून तिने विचारले,

“अरे रिक्षा इकडे कुठे?”

” आजी शंकराची रांग इकडे बोळात वळवली आहे. आज खूपच गर्दी आहे. श्रावणी सोमवार आहे ना.. “

” हो का? बरं.. “

 

तिने पूजेचे ताटं घेतलं. नारळ, हारं फुलं, साखर फुटाणे.. ती रांगेत उभी… बायका मुली मजेत होत्या. फोटो घेणं, गप्पा मारणं, व्हीडीओ काढणं चालू होतं. फोन चालू होते. रांग हळूहळू सरकत होती. पाऊण तास झाला होता. देऊळ अजून दूरच होत. हातातलं ताट जड वाटायला लागलं… मनातल्या मनात शिवमहिम्न म्हणायचं होत….. जय शिव ओंकारा आरती म्हणायची होती… पण गोंधळ गडबड आवाज… इतका होता की बस्स….. त्यामुळे मनाला शांतता नव्हती..

दीड तासानंतर देऊळ दिसलं. फुलांनी सजवलेलं लाइटिंग केलेलं आज वेगळच दिसत होतं.

 

आता रेटारेटी सुरू झाली. ताट हातात धरून हात भरून आला होता. लांबूनच दर्शन घेतलं.

 समोरची शंकराची छोटी मूर्ती आज हारात बुडून गेली होती. नारळ तिथल्या गुरूजींनी बाजूला असलेल्या नारळाच्या ढिगात टाकला. हार देवाला स्पर्श करून तो पण बाजुला ठेवला….. जेमतेम एक मिनिट दर्शन मिळालं… 

 

चार माणसं गर्दी हटवायला होते

” चला पुढे चला… ” म्हणत होते. ती आपोआप पुढे सरकली…

आज देवं नीट दिसलेच नाहीत…. केवळ दर्शनासाठी घरी कुणाचं न ऐकता अट्टाहासानी ती आली होती…

 लांबूनच कसंतरी दर्शन झालं.. खरंतर दर्शन झालं असं उगीचच म्हणायचं…. रुखरुखच लागली तिला….

 

रिक्षा करून ती घरी आली. दमली होती. दमण्यापेक्षा दर्शन नीट झाले नाही… त्यामुळे मनाला समाधान वाटत नव्हते.

 

मैत्रिणीचे दार उघडे होते. समोरच ती खुर्चीवर बसली होती. मैत्रिणीची नात नाचत समोर आली

म्हणाली.. ” आजी बाप्पाचा प्रसाद घ्यायला ये…. “

 

घरातला शंकराचा फोटो मैत्रिणीने टीपॉयवर ठेवला होता. त्याला हार, फुलं घातली होती. समई, निरांजन तेवत होतं. प्रसाद समोर ठेवला होता.

मैत्रीण म्हणाली.. ” ये ग… बैस थोडा वेळ. तुला काॅफी करते. दमल्यासारखी दिसतेस… “

असं म्हणून मैत्रीण आत गेली.

 

ती थकून खुर्चीवर बसली. मनात विचार सुरू झाले… सकाळी पूजेनंतर वाचलेली खुलभर दुधाची कहाणी तिला आठवली…. इतकी वर्ष आपण ती कहाणी वाचायची म्हणून नुसतीच वाचली…

…. तिला आज ते मनोमन जाणवले.. त्यात लपलेला खोल मतीतार्थ आपण कधी समजून घेतलाच नाही.

 

तिला आठवली शुक्रवारची कहाणी…

… सहस्त्र भोजन घालणारा भाऊ गरीब बहिणीला जेवायला बोलवत नाही. तरी ती जाते. भाऊ तिला हाकलून देतो. काही दिवसांनी तिचं दळींद्र जातं. ती समर्थ होते. मग भाऊ तिला बोलवतो. जेवायला गेल्यावर ती एक एक पदार्थावर एकेक दागिना ठेवते…. या कहाणीतून तर केवढा मोठा बोध घेता येईल………

 

दानाचं महत्त्व सांगणाऱ्या कहाण्या, व्रत का करावं हे सांगणाऱ्या, देव प्रसन्न कसा होईल ?, जगात कसे वागावे ?, चूक नसताना दोष देऊ नये,….. प्रत्येक कहाणीतून केलेले विचार प्रबोधन तिला आठवायला लागले…. ललिता पंचमीची, महालक्ष्मीची, श्रीविष्णूची कहाणी आणि इतरही कहाण्या अर्थ समजून परत नीट वाचायला हव्या आहेत.. हे तिच्या लक्षात आले.

 

अरेच्या…. म्हणजे यासाठी होत्या का या कहाण्या….

“ देवा चुकले रे मी.. मैत्रिणीने मुलाबाळांचा, सुनेचा, नातवंडांचा आत्मा तृप्त करून मग पूजा केली होती. मनाचा गाभारा कसा भरायचा हे आज कळले रे… या कहाण्यात सांगितलेला बोध प्रत्यक्ष आचरणात आणायला हवा आहे. हे जाणवले…” 

 

आज आपल्याला बऱ्यापैकी भान आलेलं आहे. आता आपण स्वतःला बदलायचचं…

उतायचं नाही मातायचं नाही आता हा सुदृढ विचारांचा वसा टाकायचा नाही … अस मनोमन तिने ठरवलं.

तरच ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण होईल……. हे तिच्या लक्षात आले.

 

मैत्रिणीनी कॉफीचा कप तिच्या हातात दिला. आणि नातीला म्हणाली,

“आजीला, तु पाठ केलेलं म्हणून दाखव”.. नात फोटोसमोर ऊभ राहून म्हणायला लागली..

 ” कैलास राणा शिवचंद्रमौळी “…

 

नातीने प्रसाद हातात दिला. तिने शंकराच्या फोटोला मनोभावे नमस्कार केला. चातुर्मासातल्या या नुसत्या कहाण्या नाहीत तर आपल्याला संपूर्ण जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या आहेत हे तिला समजले….

‘आता पावलं त्या वाटेनी टाकीन रे…. ’..

तिने कबुली दिली….. कहाणी संपली…..

तिचे डोळे भरून आले होते…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प. पू. सद्गुरू श्रीमहाराज ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

??

प. पू. सद्गुरू श्रीमहाराज ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

(माझे सद्गुरू गोंदवलेकर महाराज)

शिरसाष्टांग प्रणिपात,

उद्या गुरू पौर्णिमा आहे. त्यामुळे आपले स्मरण मला होणे अगदीच स्वभाविक आहे.

आपले एक प्रसिद्ध वचन आहे. “जेथें नाम, तेथें माझा प्राण। ही सांभाळावी खूण।।” हे वचन माझं तोंडपाठ आहे, परंतु माझी तितकी साधना नसल्याने, मी देहबुद्धीच्या आधीन असल्याने मला या वचनाची अल्पशी अनुभूती देखील नाही. मला गोंदवल्यात यायला आवडते, आपल्या घरचे अन्न (भोजनप्रसाद ) खायला आवडते. आपल्या सहवासात राहायला आवडते. पण तो योग अनेक दिवसांत आला नाही. आज आपली आठवण अनावर झाली, म्हणून हे पत्र लिहीत आहे. हे पत्र प्रातिनिधिक आहे, आपल्या प्रत्येक भक्ताच्या मनात कमीअधिक प्रमाणात माझ्या सारखीच भावना असेल… !

प्रपंच करताना दिवस कसे पटापट निघून जातात ते कळत देखील नाही. कालच गोंदवल्यात जाऊन आलो असे म्हणता वर्ष कधी होत ते लक्षात देखील येत नाही. आम्ही बेमालूमपणे प्रपंचात गुरफटले जात असतो…..

आपण म्हणता की अनुसंधान ठेवत जा, पण खरं सांगू महाराज, नेमके तेच मला जमतं नाही. सुखाचा प्रसंग आला की मी किती आणि कसा मोठा झालो आहे असे वाटते आणि दुःखाचा प्रसंग आला की मला आपली आठवण येते. आपण मला अनुग्रह देऊन कृपांकित केले आहे, परंतु मला तसे कायम वाटत नाही. माझी देहबुद्धि मला फसवते आणि ती माझ्यावर स्वार होते. सर्व कळलं असं वाटतं, पण प्रत्यक्ष आचरणात काहीच येत नाही. मी नामस्मरण या विषयावर खूप छान चर्चा करतो, चांगलं व्याख्यानही देतो, परंतु माझं नामस्मरण किती होतं, हे आपल्याला माहीत आहेच. जो सर्वज्ञानी आहे, त्यापासून काय लपुन राहणार… ?

मी या पत्रात काय लिहिणार आहे, हे सुद्धा आपल्याला माहीत आहे, परंतु आपल्याशी बोलून माझं मन हलकं होतं, म्हणून हा प्रयत्न….. ! आई पुढे चूक मान्य केली, तिची क्षमा मागितली की आई जवळ घेते, मायेने कुरवाळते आणि आपलं बाळ ‘द्वाड’ आहे हे माहीत असूनही म्हणते, बाळ माझं गुणांचं!!! हे मायेचे बोल ऐकण्यासाठी माझे कान व्याकुळ झालेत हो महाराज!! आपण अखिल ब्रह्मांडाच्या माऊली आहात. आपल्या मुलाला जवळ घ्या. मी अनेक वेळा चुकतो, करू नको ते करतो, अनेकांची मने दुखावतो, आपल्याला भूषण होईल असे वागत माही. हे सर्व खरं आहे. पण काय करू महाराज, मला सर्व कळतं पण वळत काहीच नाही हो…… आणि जेव्हां कळतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते….

श्रीमहाराज, एक करा…. तुम्हीच काहीतरी करा, जेणेकरून मला यातून बाहेर पडता येईल…. प्रपंचाच्या मोहात पडून अधिकाधिक बुडणारा मी, मला फक्त आपला आधार आहे. ज्याला जगाने दूर लोटलं, त्याला आपण मात्र स्विकारले…. आता आपणच माझे मायबाप!! 

प. पू. श्रीसद्गुरुंच्या समोर कसं बोलावं, कोणता विधिनिषेध पाळावा याचं ज्ञान आणि भान मला नाही. आपण माझ्या माऊली आहात आणि आईशी कसेही बोललं तरी ती माऊली लेकराला समजून घेत असते, साऱ्या जगाने अंतर दिलं, तरी आई कधीच लेकराला अंतर देत नाही. आणि याच भावनेने हे पत्र लिहिण्याचे धाडस मी केलं आहे…! 

या पत्रामागील माझा भाव आपण शुद्ध करून समजून घ्यावा आणि मला आपल्या चरणांशी स्थान द्यावे ही प्रार्थना!!!

आपला,

दासचैतन्य.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शिक्षक दिनानिमित्त… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ शिक्षक दिनानिमित्त… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

५ सप्टेंबर — शिक्षक दिन ! 

.. हा दिवस सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिवस! हा आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो..

मी शिक्षिका म्हणून शाळेत नोकरी केली नसली तरी शिक्षण देण्याचे काम घरात राहून बरेच वर्ष केले. माझे वडील आयुष्यभर शिक्षण खात्यात नोकरी करत होते.. बदलीनिमित्ताने ते महाराष्ट्रभर 

वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले होते. नांदेड जिल्ह्यातील अगदी लहानशा गावात असणाऱ्या सरकारी हायस्कूल वर हेडमास्टर म्हणूनही त्यांनी काम केले होते. ते खरे हाडाचे शिक्षक होते. एखादा विषय शिकवायचा म्हणजे जीव ओतून, अगदी मुळापर्यंत जाऊन शिकवणे!

त्यांचे स्वतःचे इंग्रजी खूप चांगले होते. ते घरी सुद्धा आम्हाला इंग्रजी शिकवत, पाठांतर करून घेत असत. आमच्या अभ्यासाकडे त्यांचे पूर्ण लक्ष होते. नोकरीनिमित्ताने ते मराठवाड्यात गेले आणि आम्ही मुले होस्टेलवर राहून आमचे शिक्षण पूर्ण केले. खरोखरच ते आम्हाला गुरु समान होते.

माझ्या लग्नानंतर मी सासरी आले. माझे मिस्टर मेडिकल ऑफिसर म्हणून सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करत होते. त्यामुळे मला नोकरीची गरज नव्हती आणि पहिली पाच वर्षे दोन मुलांच्या संगोपनात चालली होती. ज्यावेळी आम्ही सांगलीला बदली करून आलो, तेव्हा माझा मोठा मुलगा शाळेत बालवाडीत जाऊ लागला. तेव्हा माझी छोटी मुलगी तीन वर्षाची होती. तिला जवळपास बालवाडी नव्हती. त्याच वर्षी जून मध्ये माझे वडील माझ्याकडे आले होते. मी संसारात गुरफटून बाकी क्षेत्रात निष्क्रिय झाले होते. ते त्यांना बघवत नव्हते. ‘ अगं, तू एवढी शिकलीस, काहीतरी कर.. ‘ आणि त्याला निमित्त मिळाले की, छोटीला जवळ बालवाडी नाही, तेव्हा तू बालवाडी चालू कर’ असे त्यांच्या मनात आले आणि त्या दृष्टीने त्यांनी मला प्रोत्साहन दिले. माझ्यासाठी एक कॅटलॉग आणून दिला. “दुर्वांकुर” बालवाडी मी सुरू केली. प्रथम माझ्या बालवाडीत फक्त पाच मुले होती. वाढत वाढत ही संख्या 25 मुलांपर्यंत वाढली, पण त्यासाठी घर लहान होते. तरीही रोज बारा ते अडीच शाळा आणि ३ वाजेपर्यंत डबा खायला देणे आणि मुलांचे पालक आले की मुलांना सोडणे…. असा कार्यक्रम सुरू झाला होता. श्लोक, गाणी, नाच, गोष्टी सांगणे यात दोन-तीन तास कसे जात हे कळत नसे. खेळायला आमच्या घराचे अंगण पुरेसे होते. या बालवाडीमध्ये माझे मन रमले होते, पण नंतर असे झाले की माझ्या बालवाडीतील मुलांना दुसऱ्या शाळेत पहिलीत प्रवेश घेताना अडचण येऊ लागली, कारण माझी बालवाडी रजिस्टर्डं नव्हती. शेवटी हा बालवाडी प्रयोग मी थांबवला आणि क्लासेस घेण्यास सुरुवात केली.

आता माझी मुले थोडी मोठी झाली होती. त्यामुळे मी गणित आणि इंग्लिश चे क्लास सुरू केले. प्रथम प्रथम मलाच कॉन्फिडन्स वाटत नव्हता की, आपण पाचवी, सहावी पासूनचे विषय शिकवू शकू की नाही! तेव्हा शेवटी गुरु कोण होते तर माझेच वडील! त्यांनी मला प्रोत्साहन दिले. ते म्हणाले, ‘तू सुरुवात तर कर, म्हणजे आपोआपच तुला क्लास घेणे कळू लागेल. इकडे सासर घरात ‘आमचे सगळे नीट करून मग उरलेल्या वेळेत तू काय ते कर’ असा दृष्टिकोन असल्याने मलाच थोडी तारेवरची कसरत करावी लागली. सकाळी लवकर उठून गडबडीने सर्व आवरून साडेआठ ते साडेदहा/ अकरा पर्यंतच्या वेळेत क्लास चालू ठेवायचा आणि दुपारी तीन ते पाच या वेळेत क्लास घ्यायचा. त्यातही वेगवेगळ्या वर्गाची, शाळेची मुले- मुली ॲडजस्ट करत राहायचे.. ही सगळी कसरत तेव्हा स्वेच्छेने केली. कारण पैसा मिळवणं हा हेतू आणि मोठी गरज नव्हतीच!

माझ्या मुलांबरोबरची मुले- मुली क्लासला येऊ लागली. नकळत मुलांचाही अभ्यास चांगला होऊ लागला. साधारणपणे पंधरा वर्षे मी वेगवेगळ्या वर्गांचे क्लास घेत होते.

त्या नंतर मुलांच्या काॅलेज शिक्षणाच्या काळात मला क्लास बंद करावे लागले. पण या काळात मनाला खूप समाधान मात्र मिळाले. अजूनही जुने विद्यार्थी- विद्यार्थिनी भेटले की” बाई” म्हणून हाक मारतात,

 कधीतरी गुरुदक्षिणेची फुले मोबाईलवर देतात, तेव्हा आनंद वाटतो. ‘अरे, आपल्या नकळत हे विद्यादान थोडे तरी घडले आहे. आणि त्यातूनच काही मुले इंजिनियर, डॉक्टर, व्यावसायिक आणि विविध क्षेत्रात काम करत आहेत, हे पाहिले की मन आपोआपच भरून येते! खूप काही घडवले असे नाही, पण आपणही या शिकवण्याच्या ज्ञान यज्ञात छोटासाच स्फुल्लिंग पेटवू शकलो याचे मनाला समाधान मिळते, हे तर खरेच! पण या सगळ्याच्या मुळाशी माझे वडील माझे गुरु होते, या भावनेने मन भरून येते ! 

त्या वडिलांच्या स्मृतीला मी आज वंदन करते !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares