मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ देवपूजा… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

??

☆ देवपूजा… ☆ श्री सुनील शिरवाडकर

आमचे एक शेजारी होते. मला आठवतं ते रोज सकाळी दहा वाजता पुजेला बसायचे.अगदी साग्रसंगीत पुजा चालायची त्यांची.दोन अडीच तास.नंतर मग नैवेद्य वगैरे.त्यांची ही पूजा इतक्या वर्षांनंतरही.. म्हणजे जवळपास चाळीस वर्षांनंतरही मला आठवते यांचं कारण म्हणजे टीव्ही.त्यांचं देवघर  एक मोठ्ठा कोनाडा होता.इतका मोठा कि त्या कोनाड्यात ते स्वतः सुद्धा बसत.तर त्या मोठ्ठ्या कोनाड्यात त्यांनी एक छोटासा टीव्ही बसवुन घेतला होता.अगदी छोटा.. ब्लॅक अँड व्हाईट.एकीकडे पूजा.. मंत्र.. अभिषेक आणि दुसरीकडे टीव्ही बघणं.आरतीच्या वेळी मात्र तो टीव्ही बंद होई.

त्यांना या बद्दल बरेच जणांनी टोकलं.. टीकाही केली.पण त्यांच्यावर काही परीणाम झाला नाही.त्यांचं म्हणणं मी मनापासुन पूजा करतो.. माझ्या मनातला भाव महत्त्वाचा.. आणि माझा देव तो भाव जाणतो.त्यांची देवाला एकच प्रार्थना असायची.

‘तु पारोसा राहु नकोस..मला पारोसा ठेवु नको.’

याचाच अर्थ रोज स्नान करून तुझी पुजा करण्या इतपत मला फिट ठेव. आणि खरंच.. आयुष्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत ते पुजा करत होते.स्नान करुन पूजा करण्याएवढी त्यांची शारीरिक क्षमता अखेरपर्यंत टिकून होती. देवानं त्यांची प्रार्थना ऐकली होती.

रोज पूजा करण्याचा नियम अनेकांचा असतोच.प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत वेगळी.. कालावधी वेगळा.कोणाची पुजा पंधरा मिनिटांत होते..तर कुणाला दोन तासही लागतात.कुणाला पुजा करताना मदतीसाठी बायको लागते.तिनं मागे बसुन गंध उगाळून द्यायचं..फुलं हातात द्यायचे..तीन पर्ण असलेली बेलाची पानं नीट निवडून द्यायची .काही जण पूजा झाली की तिथुन लगेच उठुन जातात ‌मग बायकोने बाकीचा पसारा आवरायचा.

एकाची पुजेची पध्दत काही औरच होती.तो ताम्हणात देव काढायचा.. आणि सरळ वॉश बेसिनखाली धरायचा अगदी भांडे विसळल्या सारखं.मग ते देव कोरडे करून हळदी कुंकु लावायचा..शिंपडल्या सारखं.फुलं वाहिली की झाली पुजा.

अलीकडे काहीजण खुर्चीत बसूनही पुजा करतात. गुडघ्यांच्या प्रॉब्लेम मुळे मांडी घालून बसता येत नाही. मग खुर्चीत बसायचं..आणि पुढे टी पॉय  ठेवायचा..त्यावर ताम्हाण..

मंदिरांमध्ये पूजा करण्याची पद्धत वेगळी असते. तिथे देवाच्या मुर्तीला रोज मंगलस्नान..म्हणजे पूर्ण अभिषेक घातला जात नाही. केली जाते फक्त पाद्यपुजा.फक्त एकादशी आणि सणांच्या दिवशी पुर्ण मूर्तीला अभिषेक केला जातो.

गुरुचरित्रात एका अध्यायात पुजे बद्दल विस्ताराने मार्गदर्शन केलं आहे.पुजेला बसण्यासाठी कोणतं आसन घ्यावं इथपासून त्यात सांगितलं आहे.पळी पंचपात्र कुठे ठेवावं.. निर्माल्य कसं काढावं..शंखपुजा,कलश पुजा, निरांजनाची पुजा करावी‌‌‌‌.. ही पूर्वतयारी झाल्यावर मग चारी दिशांचं पूजन करावं.पुरुष सूक्तामधील वेगवेगळ्या ऋचा म्हणत अभिषेक करावा.त्यातही कोणत्या क्रिया करताना ऋचा म्हणाव्या हेही सांगितलंय.

अभिषेक झाल्यानंतर फुलं कशी वहावी.. कोणत्या देवाला कोणती पुष्पें अर्पण करावी..कोणती वर्ज्य करावी हे सांगितलंय..काही फुलं ही दुसर्या दिवशी पण शिळी समजली जात नाही हे पण सांगितलंय.निरांजन ओवाळताना कोणता मंत्र म्हणावा ..सगळं सगळं विस्ताराने सांगितलंय.

इतकी शास्त्रशुद्ध पूजा आजच्या जमान्यात तशी कठीणच..पण जशी जमेल तशी पूजा आजही घरोघर होतेच.व्यंकटेश स्त्रोत्रात तर अगदी थोडक्यात पूजेचे सुंदर वर्णन केलंय.

करुनी पंचामृत स्नान.. शुद्धोदक वरी घालुन

तुज करु मंगलस्नान.. पुरुषसूक्ते करुनिया

वस्त्रे आणि यज्ञोपवीत.. तुज लागी  करु प्रित्यर्थ

गंधाक्षता पुष्पें बहुत.. तुजलागी समर्पूं

धूप दीप नैवेद्य.. फल तांबुल दक्षिणा शुद्ध

वस्त्रे भूषणे गोमेद.. पद्मरागादी करुनी

ऐसा षोडशोपचारे भगवंत.. यथाविधी पुजिला ह्रदयात

मग प्रार्थना आरंभिली बहुत.. वर प्रसाद मागावया.

पूजेचे असं वेगवेगळं वर्णन.. मार्गदर्शन बऱ्याच ग्रंथात आहे.अगदी तश्याच पध्दतीने पूजा झाली पाहिजे असं नाही.खरंतर कोणताच देव  पूजा करा म्हणत नाही.पूजा ही देवासाठी नसतेच मुळी.ती असते आपल्यासाठी.आपलं मन प्रसन्न करण्यासाठी.आपण या कारणाने देवापुढे तासभर बसतो.कधी अथर्वशीर्ष..कधी रुद्रातील मंत्र म्हणतो..देवाला स्नान घालतो.छान लाल सुती रुमालाने देवाचं अंग पुसतो.अष्टगंधाचा टिळा लावतो.. हळदीकुंकू लावतो..मग फुले वहातो..त्यानंतर धुपदिप.. नैवेद्य..आरती.

असं सगळं झाल्यावर मग देवघरातील देवाचं ते रुप..नजर हटत नाही त्यावरुन.कानात अजुनही ‘घालीन लोटांगण..’ मधील शब्द निनादत असतात..

अष्टगंध..अत्तर..उदबत्ती..रंगीबेरंगी सुवासिक फुले या सर्वांचा संमिश्र दरवळ.. देवाच्या कपाळावरचं ते ओलसर ताजं  गंध.. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे‌‌ देवाच्या चेहर्यावरंच मंद स्मित..ते प्रसन्न सुहास्य.जणु देव सांगत असतो..आता नि:शंक मनाने कामाला जा..मी आहे तुझ्यासोबत..

आणि साक्षात देव आपल्या सोबत असणं.. यापेक्षा अधिक आपल्याला काय हवंय? मानसिक बळ म्हणजे हेच तर असतं….. पूजा करायची ती यासाठी.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तपत्या झळा उन्हाच्या… ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

? मनमंजुषेतून ?

☆ तपत्या झळा उन्हाच्या… ☆ श्री प्रसाद जोग

सध्या  सकाळ उजाडली की कालचा दिवस बरा होता म्हणायची वेळ आलीय.दिवसेंदिवस  उन्हाळ्याचा रखरखाट वाढायला लागला. त्यामुळे तापमान नाही तर तापमान अंगाची काहिली करायला लागलंय.

उन्हाळ्याचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे.काही भागामध्ये तपमान ४४/४५  डिग्री पर्यंत वाढले आहे. तशातच लोकसभेच्या निवडणुकांचे प्रचार जोरावर आहेत.  

अश्या रखरखाटामध्ये कवींना  वेगवेगळी गाणी सुचली हे विशेष.

कवी अनिल यांना केळीचे सुकले बाग आणि वेळ झाली भर माध्यान्ह ही गाणी सुचली असावीत.सुधीर मोघ्यांना तपत्या झळा उन्हाच्या हे  लिहावे वाटले असेल.

आज ही  गाणी ऐकली की तपमानात एखाद्या डिग्रीची वाढच  झाल्यासारखे वाटेल.

सगळं असह्य व्हायला लागल्यावर अचानक एक दिवशी आकाशात काळे ढग गर्दी करतील, सोसाट्याचा वारा सुटेल,विजांचा कडकडाट होऊन वळिवाच्या कोसळधारा तप्त झालेल्या जमिनीला गारे गार करतील. मातीचा सुगंध दरवळेल.हे अनुभवत असताना शान्ता शेळके यांना आला पाऊस मातीच्या वासात ग गाण्याचे शब्द सुचले असतील..

मग एन्जॉय करा उन्हाळा सुद्धा

©  श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ 05… जागतिक हास्य-दिन !!! ☆  श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

??

05… जागतिक हास्य-दिन !!! ☆  श्री संदीप रामचंद्र सुंकले 

या जगात दुसऱ्याला सहज देता येणारी एकच गोष्ट असेल, ती म्हणजे हास्य!! 

बाळाचे निरागस हास्य सर्वात आनंददायी असते.

‘हास्या’ला तसे ‘मूल्य’ नाही कारण ते ‘अमूल्य’ आहे.

या जगात प्रवेश करताना ‘रडणारा’ मनुष्य जर ‘हसतमुखाने’ मेला तर तो ‘खरा’ जगला असे म्हणता येईल.

रडायला कोणीतरी मायेचे लागते, पण हसायला मात्र अनोळखी मनुष्यही चालतो

रडण्यासाठी मनुष्याला ‘कारण’ लागते पण हसण्यासाठी कारण लागतेच असे नाही.

 रडण्याच्या बदल्यात काय मिळेल ते सांगता येईलच असे नाही, परंतु हास्याच्या बदल्यात हास्य मिळण्याची शक्यता जास्त असते.

चेहऱ्यावरील ‘स्मितहास्य’ तुमच्या चेहऱ्याचे ‘मूल्य’ वाढविते.

म्हणून हसा आणि लठ्ठ व्हा !!

ती हसली, मनापासून हसली आणि भोवताली दाटत असलेल्या छाया क्षणार्धात अदृश्य झाल्या.

पूर्वी लिहिलेली एक कविता इथे देत आहे…

*

हास्यातूनी पाझरे तुझ्या टिपुराचे चांदणे

मनास मुग्ध करी तुझे रूप हे लोभसवाणे

*

हास्यातुनी तुझ्या प्रगटती आरस्पानी दवबिंदू

श्रावणात जशा बरसती जलधार, जलसिंधू

*

हास्यातुनी तुझ्या गवसे मातृहृदयी निर्मळ मन

तव हास्यधारांच्या संगे सांत होई व्याकुळ मन

*

सदैव मुखी स्मितहास्य विलसावे कान्ह्यासारखे

विहरत राहावे गगनी परी तटस्थ कृष्णासारखे

*

दिवसभरात किमान एक तरी व्यक्तीच्या चेहऱ्यावर ‘हास्य’ आणायचा संकल्प आजच्या शुभदिनी करावा.

जागतिक हास्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “प्रेमाचं वय” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “प्रेमाचं वय” ☆ श्री मंगेश मधुकर 

रविवारची संध्याकाळ मला नेहमीच अस्वस्थ करते. उगीचच उदास वाटतं. आजसुद्धा परिस्थिती वेगळी नव्हती. टीव्हीत मन रमलं नाही. मोबईलचा कंटाळा आला. काय करावं सुचत नव्हतं. एकदम ब्लॅंक झालो. टेरेसवर जाण्याची लहर आली. सौंना आश्चर्य वाटलं. तसंही बऱ्याच महिन्यात गेलो नव्हतो. दोन मजले चढून टेरेसवर आलो. आजूबाजूला नव्या-जुन्या बिल्डिंग्जची गर्दीच गर्दी वायरचं पसरलेलं जाळं त्यावर बसलेले कावळे, कबुतरं नेहमीपेक्षा वेगळ्या गोष्टी पाहून जरा बरं वाटलं. टेरेसवर शांतता होती. कोणी डिस्टर्ब करायला नको म्हणून सहज दिसणार नाही अशी जागा पाहून बसलो. बेचैनी कमी झाली तरी मनात वेगवेगळे विचार सुरूच होते. इतक्यात बारीक आवाजात बोलण्याचा आवाज आला.

“ए, काल संध्याकाळी काय झालं.”

“काही नाही”

“बोल की, येस की नो”

“अजून मी फायनल सांगितलं नाही.”

“लवकर सांग. आधीच उशीर झालाय.”

“तुलाच जास्त घाई झालेली दिसतेय”.

“उगाच भाव खाऊ नकोस. मी मधे नसते तर काहीच झालं नसतं”

“फुकट केलं नाहीस. दोघांकडून गिफ्ट घेतलय. तेव्हा जास्त उडू नकोस.”

“ओ हो!!बॉयफ्रेंड काय मिळाला लगेच बेस्ट फ्रेंड उडायला लागली.”

“मार खाशील. गप बस. ममीचा मोबाईल आणलाय. तिला कळायच्या आत त्याच्याशी बोलू दे”

“लवकर फोन लाव. स्पीकरवर टाक”

“गावजेवण नाहीये. कुणी ऐकलं तर.. कान इकडं कर. दोघी मिळून ऐकू”नंतर फक्त दबक्या आवाजात बोलण्याचा आणि हसण्याचा आवाज येत होता. फोन बंद झाल्यावर पुन्हा नॉर्मल बोलणं सुरू झालं.

“आता पार्टी पाहिजे”

“कशाबद्दल”

“बॉयफ्रेंड मिळाला”

“तो तर मिळणारच होता. बघितलं ना कसला पागल झालाय. नुसता बघत रहायचा.”

“हा तू तर ब्युटी क्वीनच ना”

“जळतेस का?”

“माझा ही आहेच की.. ”

“तोंड पाहिलं का?ज्याच्यावर मरतेस तो तर बघत पण नाही आणि तू उगाच…”

“माझं मी बघेन. जास्त शायनिंग मारू नकोस. बॉयफ्रेंड टेंपररी पण मैत्री परमनंट आहे. लक्षात ठेव.”

“ए गपयं. सेंटी मारू नको.”

“अजून काय म्हणाला सांग ना”

“तुला कशाला सांगू. आमचं सिक्रेट आहे”

“ते फोडायला एक मिनिट लागणार नाही. आता सांगतेस की…”

“तो फार अडव्हान्स आहे”

“असं काय केलं”

“करायला अजून नीट भेटलोय कुठं?”

“मग नुसती पोपटपंची”

“ती सुद्धा जाम एक्सयटिंग आणि अंगावर काटा आणणारी”

“मामला अंगापर्यंत पोचला. लकी आहेस”

“सालं, माझ्याकडे मोबाईल नाही त्यामुळे सगळा लोचा होतो. आमचं नीट बोलणं होत नाही.”

“त्यालाच सांग की घेऊन द्यायला”

“त्याच्याकडे आईचा जुना फोन आहे. मागितला तर आधी किस दे म्हणाला”

“अय्यो.. ”खी खी हसण्याचा आवाज आला. तितक्यात खालच्या मजल्यावरून जोरजोरात हाका सुरू झाल्या तेव्हा घाबरून ताडकन उभ्या राहीलेल्या दोघी स्पष्ट दिसल्या पण त्यांना मी दिसलो नाही. दोघी धावत खाली गेल्या. टेरेसवर मी एकटाच होतो. खरं सांगायचं तर मुलींचं इतकं ‘बोल्ड’ बोलणं माझ्यासारख्या मध्यमवर्गीयाला पचनी पडलं नाही. नवीन पिढी खूप फास्ट आहे याची कल्पना होती तरीही एवढी फास्ट असेल असं वाटलं नाही. जे ऐकलं त्यावर विश्वास बसत नव्हता कारण एक सहावीत शिकणारी अन दुसरी सातवीत.

 नकळत नव्वदच्या दशकातले शाळेतले दिवस आठवले अन हसायला आलं. ते लहानपण म्हणजे मित्र, मित्र आणि मित्र यापलीकडे काही नव्हतं. भरपूर खेळायचं अन अधे-मधे अभ्यास असं चालायचं. ‘प्रेम’ वगैरे गोष्टींची जाणीव नववीत गेल्यावर व्हायची. एखादी आवडायची मग स्वप्नं गुलाबी व्हायची. तिच्यावरून चिडवणं, त्यावर मित्रांमध्ये नुसत्याच चर्चा. कृती काही नाही. लपून छ्पून बघणं चालायचं. खूप इच्छा असूनही बोलायची हिंमत नव्हती. मुलींशी बोलताना भीती वाटायची. तिथं प्रेम व्यक्त करणं तर फार लांबची गोष्ट. त्यावेळची परिस्थितीच वेगळी होती. वडीलधारे, शिक्षकांचा धाक, दरारा होता. मार पडेल याची भीती वाटायची. आता मात्र सगळंच खूप सोपं आणि सहज झालंय.” अशा विचारांची लागलेली तंद्री सौंच्या आवाजानं तुटली.

“काय झालं”तिनं विचारलं. तेव्हा नुकताच घडलेला प्रसंग सांगितला.

“मग यात विशेष काही नाही हा वणवा सगळीकडेच पेटलाय. घर घर की कहानी. थॅंक्स टू मोबाईल आणि इंटरनेट.”

“मुलं अकाली प्रौढ होतायेत हे चांगलं नाही.” 

“कारट्यांना, अजून धड नाक पुसता येत नाही अन प्रेम करतायेत”सौं हसत म्हणाली.

“हे सगळं उथळ, वरवरचं आहे. काळजी वाटते.”

“कसली”

“हे सगळं कुठं जाईल??आणि बालपणीचा निरागसपणा कुठंयं ?

“तो तर केव्हाच संपला. आता मुलांचं भावविश्व बदललयं. बॉयफ्रेंड/गर्ल फ्रेंड असणं हे प्रेस्टीज मानलं जातं. त्यासाठी वयाची अट नाही. याविषयी प्राउड फील करणारेही आजूबाजूला आहेत. आता बालपण लवकर संपतं कारण…”

“ प्रेमाचं वय् अलिकडं आलंय” 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ जगात भारी…. आम्ही भिक्षेकरी…!!! – भाग-२ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ जगात भारी…. आम्ही भिक्षेकरी…!!! – भाग-२ ☆ डॉ अभिजीत सोनवणे

(हो आम्ही टोमणे छातीवर घेऊन मिरवतो…. 🙂 – इथून पुढे 

तर; लक्ष्मी रोड / टिळक रोड किंवा इतर खरेदीच्या ठिकाणी आपले हे लोक गळ्यात आपण दिलेली हि पाटी अडकवून फिरतील आणि ज्यांच्या हातात प्लास्टिकची पिशवी आहे, अशा सर्वांना आपले हे लोक, आपली कापडी पिशवी त्यांना Get Well Soon म्हणत देतील…! (सिनेमा ने आपल्याला हा एक लय भारी शब्द दिला आहे)

जे आपले लोक रस्त्यावर अशा मोफत पिशव्या देतील, त्या प्रत्येकाला आपण एका पिशवी मागे पाच रुपये देणार आहोत,  म्हणजे एखाद्या व्यक्तीने शंभर पिशव्या वाटल्या तर त्यालाही पाचशे रुपये मिळतील… 

आपले लोक पिशव्या देतात की नाही….  

हे बघण्यासाठी मी आपल्या इतर 4 – 5 लोकांना (जे सध्या इमाने इतबारे भीक मागतात अशांना)  गुपचूप नजर ठेवण्यास सांगणार आहे…  त्यांनाही त्या बदल्यात दोन रुपये प्रति पिशवी देणार आहोत…. 

म्हणजे एखाद्याने शंभर पिशव्या दिल्या तर नजर ठेवणाऱ्या व्यक्तीला आपोआप दोनशे रुपये मिळतील…

ज्या माझ्या लोकांना आपण पिशव्या वाटायला देणार आहोत ते अत्यंत विश्वासू आहेत, त्यांच्यावर खरंतर कोणीही नजर ठेवण्याची गरज नाही…. 

पण, दारू पिणाऱ्या माणसाला दारूचे दुकान बघितलं की दारूची आठवण येते… तसंच भीक मागण्याच्या काही जागा फिक्स असतात, त्या जागी गेल्यानंतर भीक मागण्याची इच्छा आपोआप होते…. 

आणि म्हणून नजर ठेवण्याच्या निमित्ताने / बहाण्याने इतर चार-पाच जणांना भीक मागण्याच्या जागेतून  त्यांच्याही नकळत बाहेर काढता येईल. इथे आपण माणसाच्या स्वभावाचा वापर करून घेणार आहोत. 

आता बरेच लोक मला असे म्हणतील…. फुकट कशाला द्यायच्या आपल्या पिशव्या??? 

परंतु हि एक बिझनेस ट्रिक आहे, आधी फुकट द्यायचं…. सवय लावायची…. आणि त्यानंतर तीच गोष्ट दामदुपटीने विकायची… ! (अधिक माहितीसाठी मागील पाच वर्षातील स्वतःच्या घरातील वर्तमानपत्रे स्वतः चाळावीत, सर्वच माहिती देण्याचा आम्ही काही मक्ता घेतलेला नाही. ताजा कलम : पाच रुपये किलो हिशोबाने आपण वर्तमानपत्रे अगोदरच रद्दीत विकली असतील तर त्याला आम्ही जबाबदार नाही) 

बापरे… चुकून एक टोमणा मारला गेला की…. सवय हो सवय…. दुसरं काय…. ? 

तर, अनेक लोक स्वतःचे पोट भरण्यासाठी हि बिझनेस ट्रिक वापरतात…. आपण दुसऱ्याचे पोट भरण्यासाठी, दुसऱ्या एखाद्याला जगवण्यासाठी जर हि ट्रिक वापरली तर त्यात गैर काय…? 

विचार करा…. इतक्या साध्या गोष्टीमुळे किती कुटुंबं उभी राहतील ? रस्त्यावरचे  किती भिक्षेकरी कमी होतील ?? आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे प्लास्टिकचा वापर किती कमी होईल ??? 

पिशव्या शिवणारे, विकणारे आणि नजर ठेवणारे यांना यातून पैसे मिळतील हा एक भाग आहेच…  

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या सर्व गोष्टींमुळे भीक मागण्यापासून आपण त्यांना विचलित करणार आहोत… हे सर्व करत असताना, नुसते फिरायचे त्यांना पैसे मिळत असतील, भीक मागायच्या जागेवर जर ते थांबणार नसतील…. तर त्यांना भीक मागायची आठवण तरी राहील का…. ??? 

रडणाऱ्या लहान मुलाच्या हातात एखादं खेळणं देऊन त्याचं लक्ष विचलित करून त्याला शांत करणं… जगातल्या प्रत्येक आई आणि बापाने हेच आजवर केलं आहे…. 

(हल्ली रडणाऱ्या बाळाच्या हातात आई मोबाईल फोन देते तो भाग वेगळा, बाळ शांत झालं की मग कसं शांततेत फेसबुक, इन्स्टा वगैरे पाहता येतं 

असो, तीच संकल्पना आपण इथे राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. ! तेच साधं सोपं गणित वापरण्याचा इथे प्रयत्न आपण करत आहोत…. 

शिवाय फुकट देऊन सुद्धा, “चीत भी हमारी पट भी हमारी”…. !!! 

४.  यानंतर पुण्यातले मोठे मॉल, दुकानदार यांना मी स्वतः भेटेन…  हात जोडून त्यांना आपल्या पिशव्या विकत घ्यायची विनंती करेन. यातून जो पैसा मिळेल तो  पिशव्या शिवणाऱ्या, विकणाऱ्या आणि नजर ठेवणाऱ्या व्यक्तींना आपण परत करू. 

यानंतर मला माहित आहे…. 

आता आपला प्रश्न येईल, आम्ही यात काय मदत करू शकतो… ???

१. तर, पहिली गोष्ट म्हणजे प्लास्टिकची पिशवी वापरणे बंद करा माय बाप हो…..आणि स्वतःच्या घरातील कापडी पिशवी वापरा; नसेल तर आमच्याकडे मागा. आम्ही ती तुम्हाला पाठवू “चकटफू”…!!! 

२. एक फूट उंच, अर्धा फूट रुंद अशा आकाराच्या पिशव्या शिवता येतील असे कापड आपण आम्हाला देऊ शकता. उदा.जुनी ओढणी, जुनी साडी, मांजरपाटाचे किंवा तत्सम कापड इत्यादी…. (अंगडी टोपडी, फाटके बनियन, विरलेले रुमाल, तसेच घरात जुने शर्ट पॅन्ट पडलेच आहेत तर देऊन टाकू….  असे टाकाऊ कपडे इत्यादी गोष्टी देऊ नयेत… वितभर कपड्यापासून हातभर पिशवी तयार करायला आमचे पितामह काही स्वर्गातून ट्रेनिंग घेऊन आलेले नाहीत…  )

नाही म्हणता म्हणता, अजून एक टोमणा गेलाच की राव चुकून…. ! 

जाऊ द्या…. 

३. आपल्या परिसरातील दुकानदार / मॉल यांना आमच्या वतीने या पिशव्या कमीत कमी किंमतीत विकत घ्यायला विनंती करू शकता. यालाही ते तयार नसतील तर आम्ही त्यांना Get well soon म्हणत फुकट पिशव्या पाठवू…. 

प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि भिक्षेकर्‍यांचे लक्ष विचलित करणे हा आमचा मूळ हेतू आहे, यातून कोणताही व्यवसाय करण्याचा हेतू नाही…! 

४. माझ्याकडे जमा होत असलेल्या देणगीचा विचार करून मी सुरुवातीला साधारण दहा ते बारा लोकांना अशा प्रकारे काम देऊ शकतो. पण भीक मागणाऱ्या जास्तीत जास्त लोकांना यात सहभागी करून, त्यांना मानधन मिळावे, प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णतः बंद व्हावा…. हा प्रकल्प आणखी मोठ्या प्रमाणावर करता यावा…. यासाठी आपण आम्हाला ऐच्छिक देणगी देऊ शकता. 

17 एप्रिल माझा वाढदिवस… याच दिवशी श्रीराम नवमी होती…. याच दिवसाच्या मध्यरात्री मला हि संकल्पना सुचली…. योगायोग म्हणायचा की आणखी काही ? मलाही कळत नाही….! 

आपण कुणीही श्रीराम बनू शकत नाही…. पण आपल्या जवळ असणारे “भात्यातले बाण” आपण समाजासाठी “रामबाण” म्हणून तर नक्कीच वापरू शकतो… 

बघा पटतंय का… ??? 

माझ्या वाढदिवसा दिवशी मला सुचलेली ही संकल्पना… ! 

यामुळे थोड्या प्रमाणात का होईना, परंतु प्लास्टिकचा वापर कमी होईल, त्यामुळे निष्पाप प्राण्यांचे प्राण वाचू शकतील, अनेक सामाजिक आणि वैद्यकीय धोके थोड्या तरी प्रमाणात कमी होतील… माझे भीक मागणारे किमान दहा ते बारा लोक पहिल्या फटक्यातच भिकेतुन बाहेर पडतील… 

“भिक्षेकरी”  म्हणून नाही…. तर “कष्टकरी” होऊन; ‘गावकरी” म्हणून जगण्याकडे ते एक पाऊल टाकतील…! 

वाढदिवसाचं इतकं मोठं गिफ्ट या अगोदर मला कधीही मिळालं नव्हतं…!!! 

आयुष्यभर ऋणात राहीन मी या गिफ्टच्या….!!!

– समाप्त – 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ जगात भारी…. आम्ही भिक्षेकरी…!!! – भाग-१ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ जगात भारी…. आम्ही भिक्षेकरी…!!! – भाग-१ ☆ डॉ अभिजीत सोनवणे

“पुणेरी टोमणे मारूया… प्लास्टिकला पळवून लावूया… “

प्लास्टिकच्या वस्तू…. खास करून प्लास्टिकच्या पातळ पिशव्या यांचे विघटन होत नाही.

पुरातन काळात राक्षस नावाची संकल्पना होती, आजच्या काळात प्लास्टिकच्या पिशव्या हाच एक राक्षस आहे. विघटन न झाल्यामुळे पर्यावरणाला धोका… माणूस म्हणून आपल्यालाही अनेक वैद्यकीय – सामाजिक धोके…. आणि उकिरड्यात पडलेल्या पिशव्या निष्पाप मूक प्राण्यांच्या पोटात जातात आणि त्यांचे मृत्यू होतात.

गोहत्या थांबवण्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न केले जातात; परंतु प्लास्टिक पिशव्या खाऊन ज्या गोमाता देवाघरी गेल्या, त्यांचा हिशोब कोणी ठेवला आहे का… ? 

हा विषय विविध स्तरावर सांगितला, तरी काही मूठभर लोक सोडुन इतरांना या विषयाशी काहीही घेणं देणं नाही… ! 

“भिक्षेकरी” हा असाच दुसरा ज्वलंत विषय…

भीक मागणारे मागतात आणि दोन पाच रुपये भीक देऊन, पुण्य मिळेल या भावनेने लोक भीक देतात…

… दोन पाच रुपयात पुण्य मिळतं ??? पुण्य इतकं स्वस्त असतं… ? 

अशा दोन पाच रुपये भीक देण्याने; देणारा, अप्रत्यक्षपणे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढवायला मदत करतो, भीक मागण्यासाठी आपली मुलं पळवली जातात, चांगल्या लोकांना धाक दाखवून भीक मागायला लावली जाते, यांची मुलं कधीही शाळेत जात नाहीत, मुलांचं अख्ख आयुष्य बरबाद होतं….

अजून सुद्धा खूप काही आहे… विषय मोठा आहे, तो मी माझ्या पुस्तकात सविस्तर मांडला आहे…

“भीक नका देऊ… एखाद्याला पायावर उभं राहण्यासाठी मदत करा… ” हे मी विविध स्तरावर जीव तोडून सांगितलं आहे, तरी आपल्यासारखे काही संवेदनशील लोक सोडुन इतरांना या विषयाशी काहीही घेणं देणं नाही… ! 

तर या दोन समस्यांची सांगड एकत्र कशी घालता येईल याचा विचार करत होतो… ! 

भीक मागणाऱ्या लोकांची खूप मोठी ताकद आज माझ्या मागे उभी आहे…. या सेनेचा सेनापती म्हणून कसा वापर करून घेऊ ? हा सतत विचार मी करत असतो….

रस्त्यात जाताना कितीतरी वेळा आपल्याला पाईपलाईन फुटलेली दिसते, आकाशाकडे हे पाणी उंच उसळी घेत असतं…. त्याचा फोर्स खूप जास्त असतो….. म्हणजे फुटून बाहेर पडणाऱ्या या पाण्याला सुद्धा आकाशात उंच भरारी घ्यायची आहे, त्याच्यात तितकी धम्मक आहे, परंतु योग्य वेळी योग्य साथ मिळत नाही… म्हणुन मग ते पाणी निपचितपणे गुपचूप जमिनीवर पडतं आणि शेवटी एखाद्या गटारात वाहत जातं… आणि मग गटारातलं पाणी म्हणून पुढे कधीही याचा उपयोग होत नाही…. ! 

हाच संबंध मी भीक मागणाऱ्या लोकांशीही जोडतो…

त्यांच्याकडे असणारी ताकद अशीच अफाट आहे… त्यांच्यातही खूप मोठा फोर्स आहे…. त्यांनाही आभाळात उंच भरारी घ्यायची आहे; परंतु योग्य वेळी योग्य ती साथ मिळत नाही… शेवटी थकून ते सुद्धा निपचितपणे गुपचूप जमिनीवर पडतात… पुढे एखाद्या गटारात सापडतात…. आणि मग “भिकारी”असं हिनवून, त्यांच्यावर शिक्का मारून, त्यांनाही कधीही माणसात आणलं जात नाही…. !

भीक मागणाऱ्या माझ्या लोकांमध्ये असलेल्या इतक्या मोठ्या ताकदीला, सेनापती म्हणून आवरण्यास… सांभाळण्यास… वळण लावण्यास… बऱ्याच वेळा मी कमी पडतो… बऱ्याच वेळा मला अपराधी वाटतं…. !

निसर्गाने या समाजाच्या देखभालीसाठी माझी निवड केली, परंतु मी खरंच तितका सक्षम आहे का ? या विचाराने काही वेळा मी खचून जातो…. ! 

खूप वेळा मी परिस्थिती समोर गुडघे टेकतो… खाली मान घालतो… पण खाली मान घालून सुद्धा विचारच करत असतो; की मला यांच्यासाठी अजून काय करता येईल ??? 

कित्येक लोक मला म्हणतात, ‘डॉक्टर, तुम्ही किती सुखी आहात… तुम्हाला किती सुखात झोप लागत असेल…. ‘

पण मला झोपच लागत नाही; ही वस्तुस्थिती आहे… अजून काय करता येईल ? काय करता येईल ??  काय करता येईल??? – हा इतकासा किडा रोज रात्री मला चावत असतो… मग माझी झोप उडून जाते, मी घड्याळाकडे कुस बदलत येड्यासारखा पहात राहतो…. बारा वाजतात, मग दोन वाजतात, चार वाजतात, पुढे  सहा सुद्धा वाजतात… घड्याळाचा काटा शांतपणे फिरतच असतो… तो मला चिडवत असतो… आणि हे कमी म्हणून की काय अलार्म वाजतो…. उठ रे बाबा…. ! 

उठायला मी झोपलोच कुठे आहे मित्रा…. ? पण कोणाला सांगू ? 

रात्रीच्या त्या अंधारात आम्ही दोघेच जागे असतो….

एक तो घड्याळाचा काटा आणि दुसरे माझे विचार… ! 

तो शांतपणे फिरत असतो…. आणि मी  सैरभैर… !

याच सैरभैर विचार मंथनातून, एक संकल्पना माझ्या डोक्यात परवा मध्यरात्री जन्माला आली…

मला नाही वाटत, या अगोदर संपूर्ण जगामध्ये अशी काही संकल्पना राबवली गेली असेल… !

संकल्पना सांगतो थांबा…. त्या अगोदर थोडी पार्श्वभूमी सांगावी लागेल….

मी मूळचा साताऱ्याचा, परंतु आख्ख आयुष्य पुण्यात गेलं… मग वाण नाही तर गुण लागणारच की…. ! 

माझ्या या पुण्यानं मला खूप काही दिलं…. त्याबरोबर टोमणे मारायला सुद्धा मला शिकवलं…

त्या अर्थाने “पुणेरी माणूस” माझा गुरु आहे… ! 

म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी माझ्या घरात बसून एक फूल, सर्व अस्सल पुणेरी माणसांना नेहमीच समर्पित करतो… (हो एकच फूल मिळेल… आमच्या बागेतली सर्व फुलं तुम्हाला वहायला, आम्ही काय कुठचे जहागीरदार नाही किंवा कुठल्या संस्थानचे संस्थानिक सुद्धा नाही… शिवाय तुम्ही काय आमचे जावई नाहीत किंवा व्याही सुद्धा नाहीत… तेंव्हा एक फूल घ्यायचं तर मानानं घ्या, नाहीतर तेही आम्ही परत काढून घेऊ… )

तर हा असा आहे पुणेरी टोमण्यांचा झटका… ! 

टोचत नाही…. बोचत नाही…. पण विषय हृदयापर्यंत भिडतो थेट…. !!! 

आता वर जाऊन कंसातील वरील वाक्य परत वाचा…. वाचताना मनातल्या मनात नाकातून वाचावे, म्हणजे “कोंकणी” हापूस आंब्याचा खरा स्वाद येईल….

ओके… वर जाऊन, नाकातून वाचून…. परत खाली आला असाल, तर आता संकल्पना सांगतो…

ती मात्र नाकातून वाचायची नाही…

१. तर, अशाच पुणेरी टोमण्यांचा वापर करून मी काही बोर्ड तयार करणार आहे…. ! 

“प्लास्टिक पिशव्या वापरणे सोडून द्या आणि कापडी पिशव्या आमच्याकडून घ्या…. किंमत तुम्ही ठरवाल ती…. ” अशा अर्थाचे बोर्ड तयार करून घेणार आहे, अर्थात पुणेरी स्टाईलनेच, टोमण्यांच्या स्वादासह…. ! 

२. पूर्वी भीक मागणाऱ्या लोकांना आपण नवीन शिलाई मशीन घेऊन दिली आहे अशा, सुरुवातीला किमान चार लोकांना पिशव्या शिवायला लावायच्या. त्यांना पिशव्या शिवता येईल अशा प्रकारचे कापड आपणच द्यायचे, एक पिशवी शिवल्यानंतर त्याचे पाच रुपये त्यांना द्यायचे. (दिवसातून शंभर पिशव्या त्यांनी शिवल्या तर त्यांना पाचशे रुपये मिळतील)

३. शिवलेल्या पिशव्या यानंतर पाच ते सहा भीक मागणाऱ्या इतर लोकांना देऊन; तयार केलेल्या  “पुणेरी टोमण्यांच्या पाट्या” त्यांच्या गळ्यात आणि पाठीवर अडकवायच्या….

हो – आम्ही टोमणे छातीवर घेऊन मिरवतो…. :-

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पाहुणा…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “पाहुणा…” ☆ श्री मंगेश मधुकर 

कॉलेजच्या रियुनियनला सहकुटुंब गेलेलो. अनेक मित्र-मैत्रीणींची भेट झाली. जुन्या आठवणी, भरपूर खाणं अन पोटभर गप्पांमुळे संध्याकाळ संस्मरणीय झाली. मस्त मूड होता. कधी नव्हे ते गाणं गुणगुणायला लागलो. बायको आणि मुलीला आश्चर्य वाटलं. घरी पोचलो तर दार सताड उघड आणि हॉलमध्ये खुर्चीत मांडी घालून आई बसलेली.

“काय गं, दार उघड ठेवून अशी का बसलीयेस”

“बरं झाला आलास. किती वेळची वाट बघतेय. ”आई.

“काय झालं. अर्जंट होतं तर फोन करायचा ना”

“म्हटलं तर अर्जंट म्हटलं तर नाही. ”

“आई, मूड चांगलाय. नीट सांग. काय झालं”

“घरात पाहुणा आलाय. ”

“मग त्यात टेंशन कसलं”

“विशेष पाहुणा आहे”

“कोण?कुठयं?

“आत्ताच कपाटामागे गेलाय”

“पाहुणा कपाटामागे??आई, काय बोलतेस तुझं तुला तरी कळतयं का?” 

“अरे, उंदीर मामा घरात शिरलेत. तास झाला खुर्चीतून हलली नाहीये. ”आईचं ऐकून बायको आणि मुलगी “ईssईss”करत किंचाळत घराबाहेर गेल्या. पाठोपाठ आईसुद्धा. खरं सांगायचं तर मीसुद्धा जाम घाबरलो. उंदीर पाहिला की कसंतरीच होतं. शिसारी येते. खूप भीती वाटते.

“अहो, आधी त्याला बाहेर काढा”

“बाबा, लवकर”

“ही काठी घे आणि त्याच्या डोक्यात घाल. ईकडून तिकडं फिरून मेल्यानं वात आणलंय. ”

“ए, बायांनो!!जरा थांबता का?”.

“आता कशाला थांबायचं”आई.

“अगं हो, जरा बघू तर दे. ”

“ईss उंदराला काय पहायचं. ”मुलगी 

“मी बाहेर जातो. काय करायचं ते तुम्हीच ठरवा. ”  

“आधी त्याला घालवा मग कुठंही जा”बायको.

“मग एकदम गप्प बसायचं आणि आधी घरात या. उगीच आख्ख्या सोसायटीला कळायला नको”. आई खुर्चीवर तर मुलगी आणि बायको सोफ्यावर बसल्या. ‘वासरात लंगडी गाय शहाणी’ न्यायानं मीच तो काय सोकॉल्ड धीट, शूर??भीती वाटत होती तरीही उसनं अवसान आणून भिरभिरत्या नजरेनं काठी कपाटाजवळ आपटायला सुरुवात केली.

“जास्त जवळ जाऊ नको रे”

“अहो, बेतानं नाहीतर एकदम अंगावर येईल. ”

“उंदीर चावतो का” आई, बायको, मुलगी पाठोपाठ बोलल्या.

“शांत बसा नाहीतर काठी घ्या त्याला हाकला. ”मी चिडलो.

“आमच्यावर रागवण्यापेक्षा उंदराला बाहेर काढा. बघू या जमतयं का?”बायकोचं बोलणं सहन न झाल्यानं रागाच्या भरात जोरात काठी जमिनीवर फेकली तेव्हा कपाटामागचा उंदीर भसकन बाहेर आला. अचानक समोर आल्यानं घाबरून मागे सरकलो तर उंदराला पाहून आई, बायको, मुलगी एकदम ओरडल्या त्या आवजानं उंदीर जागेवरच एक इंच उडाला आणि किचनमध्ये पळाला. पाठोपाठ अस्मादिक किचनमध्ये. नक्की कुठं लपलाय कळत नव्हतं त्यातच परडीला धक्का लागून एक कांदा पायावर पडला. घाबरून जोरात ओरडलो.

“अहो, आधी दोन्ही बेडरूमची दारं लावून घ्या. ”

“दारं बंदच आहे”आई.

“आता काय करायचं”मुलगी.

“फक्त वाट बघायची. ” भिंतीला टेकून उभा राहिलो. नजर शोधत होतीच. बराच वेळ झाला तरी काहीच हालचाल जाणवली नाही. पुन्हा ओटा, ट्रॉली, शेल्फवर काठी आपटायला लागलो.

“उंदराच्या नादात किचनमध्ये तोडफोड करू नका. सावकाश!!”बायकोचा अनाहूत सल्ला.

“मला कळतं. ऐकून घेतो म्हणून प्रत्येकवेळी नवऱ्याला सुनवायची गरज नाही. ”

“ते माहितीये पण स्वभाव धसमुसळायं ना म्हणून आधीच सांगितलं नंतर सॉरी म्हणून उपयोग होणार नाही. ” गरज नसताना बायकोनं टोमणा मारल्यानं संताप अनावर होऊन रॅकवर जोरात काठी मारली तर उंदीर एकदम अंगावर आला, हेलपाटलो कसंबसं सावरत काठी मारली पण नेम चुकला. घाबरलेला उंदीर आईच्या दिशेने गेला तर ती ओरडायला लागली. हातातली काठी फेकली तेव्हा तो कपाटामागे लपला. पुन्हा काहीवेळ शांतता आणि एकदम तो तुरुतुरु पळत सोफ्याच्या दिशेनं गेल्यावर बायको आणि मुलगी घाबरून सोफ्यावरच उभ्या राहिल्या. बायको जोरजोरात “हाड हाड” करायला लागली.

“ममा, तो कुत्रा नाहीये, ” 

“तू गप गं. आधी त्याला हाकल मग मला अक्कल शिकव” मायलेकी वाद घालायला लागल्या अन यागडबडीत उंदीर पुन्हा बेपत्ता. झालं पुन्हा शोधाशोध!!सगळेच बेचैन, अस्वस्थ. जरा कुठं खट्ट वाजलं तरी दचकत होते. उंदीर घरात असेपर्यंत कोणालाच शांत झोप लागली नसती त्यामुळे काहीही करून त्याला बाहेर घालवणं किवा मारणं गरजेचं होतं परंतु तो हाती लागत नव्हता. इकडून तिकडं नाचवत होता. खूप दमलो. भीतीची जागा संतापानं घेतली. रात्रीचे अकरा वाजून गेलेले अन आम्ही एवढ्याशा जीवाच्या दहशतीखाली होतो आणि कदाचित तो आमच्या………

“आता रे???, शेजारच्यांना बोलावू का?” आई म्हणाल्यावर मी भडकलो.

“जरा दम धरतेस. आल्यापासून तेच करतोय ना. कशाला उगीच गाव गोळा करायचाय”

“तुम्ही चिडू नका. मदतीसाठी म्हणून त्या म्हणाल्या. ”बायकोनं समजावलं.

“आता त्याला सोडायचा नाही. तू एक काम कर, किचनची वाट आडव. आई, तू खुर्चीवरून हलू नकोस. कार्टे, तो फोन बाजूला ठेव आणि शोकेसजवळ थांब. हातात काहीतरी ठेवा जर अंगावर आलाच तर उपयोगी पडेल. ” बोलत असतानाच तो दिसला जोरात काठी मारली पण परंतु परत नेम चुकला.

“बाबा, त्याला बाहेर घालवू. मारायला नको. छोटसं पिल्लूयं”

“बरं, रेडी. घाबरू नका. फक्त पाच मिनिटं लागतील”स्वतःसकट सर्वांचा उत्साह वाढवायचा प्रयत्न केला. हातात झाडू घेऊन आई खुर्चीत, फरशी पुसायचा मॉप घेऊन बायको किचनच्या दारात, प्लॅस्टिकचा ट्रे घेऊन मुलगी शोकेसच्या बाजूला उभी राहिली.

“सगळे तयार आहात. तुमच्या बाजूला येऊन द्यायचं नाही. दाराच्या दिशेने ढकलायचं. ओके”काठी आपटायला लागल्यावर काही वेळानं तो बाहेर आला अन किचनकडे गेला पण टिपॉय आडवा टाकून वाट बंद केल्यामुळे शोकेसच्या बाजूला गेला पण मुलीनं ट्रेनं ढकललं. लपायला जागा सापडत नसल्यानं त्याची पळपळी सुरु झाली अन गोंधळ वाढला. पळापळ करून थकलेला अन घाबरलेला उंदीर हॉलच्या कोपऱ्यात थांबला. दरवाजाच्या दिशेनं वळवण्यासाठी प्रयत्न केले तर एकदम तो किचन नंतर सोफ्याकडं मग शोकेसच्या दिशेनं गेला पण आवाजामुळं मागे फिरला. काही क्षण एका जागी थांबून अंदाज घेतल्यावर अचानक तो एकदम घराबाहेर गेला. अवघ्या काही सेकंदात हे सगळं घडलं. पटकन दार लावून घेतलं. आई जोरजोरात टाळ्या वाजवायला लागली तर मुलगी बायकोला बिलगली. मी मात्र  “हुssssश” करत मटकन खाली बसलो. खूप मोठं ओझं उतरल्यासारखं वाटत होतं. तितक्यात बायकोनं विचारलं “सासूबाई, नक्की पाहुणा एकच आला होता की… ” ते ऐकून मी कोपरापासून हात जोडले. तिघीही जोरजोरात हसायला लागल्या. —-

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सुखाचा शोध…” – लेखिका : सुश्री विजया वाड ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

??

☆ “सुखाचा शोध…” – लेखिका : सुश्री विजया वाड ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

उदयाचल हायस्कूल, गोदरेज, येथे विज्ञान शिक्षिका म्हणून मी कार्यरत होते. सारा दिवस सासूबाई मुली सांभाळत, त्यामुळे सकाळचा चहा, नाश्ता ही माझी जबाबदारी होती. 

उदयाचलची नोकरी आठ पन्नास ते ५ होती. म्हणजे रोज आठ तास दहा मिनिटे मला आठ सोळाची गाडी मुलुंडहून विक्रोळीस जाण्यासाठी पकडावी लागे. म्हणजे घर आठ पाचला सोडावे लागे.

सक्काळी मी साडेसातला धांदलीत चहा केला नि गाळणीतला चहाचा चोथा (जो फार गरम होता) डस्टबिनमध्ये रिकामा करायला धावले.

माझ्या सासूबाई बेसिनवर दात घाशीत होत्या नि डस्टबिन बेसिनच्या खाली होती. त्या बाजूस होईनात म्हणून मी पायाच्या अंगठ्याने कुंडीचे झाकण दाबून उघडले नि तो चोथा कुंडीत टाकला. 

दुर्देव माझे ! तो उकळता चोथा कुंडीत न पडता त्यांच्या पायावर पडला. चुकून हो !

तुम्हाला पण वाचून पटलं की नाही हो ? पण त्या संतापल्या. ब्रश फेकला. जोरात ओरडल्या, “मुद्दाम उकळत्या चहाचा चोथा माझ्या पायावर टाकला.” मी ओशाळी उभी ! “कालचा सूड उगवला !” त्या पुढे ओरडल्या.

मधल्या खोलीत माझे सासरे पेपर वाचत होते नि यजमान दाढी करीत होते. दोघे धावत आले. “कसला सूड? काय गं? शिकलेल्या मुली अशा वागतात?” सासारे रागावले. 

सासूबाईंचा गोरा गोरा पाय लाल झाला होता नि त्यावर फोड? बाप रे बाप ! “अहो तो चहाचा गरम चोथा खरोखर चुकून पडला होता हो ! कसला सूड?”

त्याचं असं झालं होतं. मी नि माझे यजमान सासू-सासऱ्यांजवळ राहात होतो. राहाते घर त्यांचे होते. मुली चिमुकल्या होत्या. आई आपल्या मुलांना शिस्त लावायचा प्रयत्न करतेच ना? सांगा पाहू ! 

प्राजक्ता-माझी मोठी मुलगी- हिला काही कारणाने मी कुल्यावर चापट मारली. तशा त्या संतप्त झाल्या. इतक्या तापल्या की धुण्याची मोठी काठी त्यांनी मजसमोर धरली, ” ही घे, नि मार माझ्या टाळक्यात ! मुलींवर हात उचलते !” त्या कडाडल्या. 

मी सौम्यपणे म्हटलं, “माझ्या मुलींना मी शिस्त लावायचा प्रयत्न करतेय, त्यात कृपा करून तुम्ही मधे पडू नका.” चुकलं का हो माझं काही प्रिय वाचकांनो? 

पण त्या ठाशीवपणे म्हणाल्या, “ते ‘आपल्या’घरात ! माझ्या घरात हे चालणार नाही !” मी गप्प ! अपमान गिळला. ते तेवढ्यावरच थांबलेले वर्तुळ… ! त्याचा सूड ?

मी आश्चर्य करीत उभी ! माझे यजमान दाढी करीत होते. अर्ध्या गालावर साबण ! तसेच उठले, मला म्हणाले, “का गं आईच्या पायावर तू  उकळत्या चहाचा चोथा टाकला? किती भाजला तिचा पाय ! फोड आले !”

सासरे बोलले… मी गप्प बसले. पण नवरा ? त्यालाही असं वाटतं की मी हे मुद्दाम केलं? आपण कुणाच्या जिवावर सासरी येतो हो ? नवरा अगदी ‘आपला’ असायला हवा ना ! सांगा! त्याला तरी वाटायला हवं नां…. की बायकोनं हे मुद्दाम नाही केलं !

बरं ! जी ‘सूडकथा’ सासूबाईंनी रंगविली ती ना ह्यांना ठाऊक होती ना माझ्या सासऱ्यांना !राईचा पर्वत कसा होतो कळलं ना?

आठ सोळा केव्हाच चुकली होती. नवऱ्यास मी सासूच्या धाकाने अहो जाहो करीत असे. पण त्या क्षणी फ्यूज उडाला होता. रागाचा पारा उसळी मारुन डोक्यापार गेला होता. मी एकेरीवर आले. पर्वा न करता कुणाची !

“तुलाही असं वाटतं की मी हे मुद्दाम केलं? तुझाही माझ्यावर विश्वास नाही? मग कशाला राहू मी या घरात? चालले मी !” रागाच्या अत्युच्च क्षणी ही अठ्ठावीस वर्षांची विजू घर सोडायला निघाली. 

मी एक बॅग काढली. माझे दिसतील ते कपडे त्या भरले. मग मुलींचे फ्रॉक भरू लागले. नवरा म्हणाला, “त्यांचे फ्रॉक का भरतेयस?”

आता तर माझ्या रागाने परिसीमा गाठली. मी रागाने त्याला दम भरला “मुलं ‘माझ्या ‘ आहेत. तू पोटातून काढल्यायस का? मग गप्प बस !” यावर तो निरुत्तर ! पुरुष होता ना ! मुली पोटातून कशा काढणार ? माझे सासू-सासरे अवाक्… निशब्द ! काय चाललेय काय हे ?

माझा दादा आर्थररोड जेलचा सुपरिटेंडेंट होता. माझ्या घरात नवरा डॉक्टर असल्याने फोन होता. १९७३ मध्ये तेव्हा घरात एमटीएनएलचा फोन असणे हेही अप्रूप होते. 

मी दादाला फोन लावला. बापविना लेकरु होते मी ! दादाच वयाच्या अकराव्या वर्षापासून माझा बाप होता. “दादा, असं झालं….” मी रडत रेकॉर्ड लावली. ” ज्या घरात विश्वासच नाही उरला, तिथे का राहू मी?”

दादाने शांतपणे सारे ऐकून घेतले उत्तम श्रोता बनून. “मी येतो तो पर्यंत शांत बस. मी नक्की घेऊन जाईन हं विजू.”

बस. मला आणखी काय हवे होते. मी लगेच डिक्लेअर केले. “दादा माझा येतोय मला न्यायला. मी नि मुली तासाभरात निघू.”

घर चित्रस्तब्ध झाले. मुली तोंड शिवून कोपऱ्यात उभ्या. रोज मी शाळेत असे तेव्हा त्या आजीजवळ असत. पण या क्षणी कोण ‘आपलं’ ते त्या चिमण्या जीवांना कळत नव्हतं. आईवर लेकरांचा जीव असतोच नं ! 

आम्ही तेव्हा मुलुंड पश्चिम येथे रणजित सोसायटीत राहायचो. दादा तासाभरात आला. पूर्ण वेश ! जेलरचा ! एकदम कॅडॅक !… सोसायटीभर गॅलऱ्या भरल्या‌.

वाडांकडे जेलर आला ! बूट काढून चक्क खाली बसला. सासूबाईंच्या पायाशी. त्यांच्या फोड आलेल्या पायावर मायेने हात फिरविला अलवार. “विजू, बर्नाल लावले का?” 

या भांडणात कुणाच्याही ते लक्षात आले नव्हते. मी धावत बर्नाल आणले मधल्या खोलीतून.     त्याने ते पायाला लावले. मग म्हणाला, “ती मिळवती आहे आणि नसती तरी मला जड नाही. बाप आहे मी तिचा. पण अभिमानाची टोक इतकी ताणावी? मुलींना बाप कुठला मग?”

माझ्या सासूबाईंनी एकदम हात पसरले. नातींना जोरात म्हणाल्या, “कुठेही जायचं नाही मला सोडून. निघाल्या आईच्या मागे मागे… या गं या… माझ्या कुशीत या दोघी.” 

मुली धावल्या. आजीला घट्ट बिलगल्या मग आजी रडायला लागली. तशा त्याही रडू लागल्या. त्यांना किती सवय होती हो एकमेकींची. 

आता धीर एकवटून माझा नवरा पुढे झाला. माझं मनगट धरलं “कुठे चाललीस गं मला एकट्याला सोडून? काही वाटतं का? कुठेही नाही जायचं ! काय समजलीस?” 

मी म्हटलं “बरं !” मला तरी कुठे जायचं होतं हो ? पण हे शब्द त्याच्या तोंडून यायला हवे होते की नाही?

दादा चहा पिऊन आनंदाने ड्यूटीवर परतला. मुली मला बिलगल्या. माझे मुके घेतले. गळ्यात हात टाकले. मुलांनाही किती समजतं ना !

त्या रात्री आम्ही चौघं मुली झोपल्यावर एकत्र बसलो. कौटुंबिक सभा. माझे सासरे-बापू म्हणाले, मला. “हे पहा, विजय हा आमचा एकुलता एक मुलगा आहे त्यामुळे आम्ही नि तो, इनसेपरेबल आहोत. वेगळं राहायचा विचार मनातही आणू नकोस तू. तो मातृ-पितृ भक्त आहे. 

आता एकत्र राहायचं तर वाद कधी तरी होणारच. ती ‘सूड सूड’ काय म्हणत होती ते मला ठाऊक नाही. जाणून घ्यायचीही इच्छा नाही. एकच सांगतो आपण सर्वांनी वाद झाले तर भांडू पण दुसऱ्या दिवशी ते भांडण उकरुन काढायचे नाही. नवा दिवस नवा उजाडला पाहिजे. आलं लक्षात? रात गयी… बात गयी !”

ते तत्त्व आम्ही चौघांनी आयुष्यभर सांभाळलं. माझं ‘पुस्तक’ लाज न बाळगता तुमच्यासमोर एवढ्यासाठी उघडलं प्रिय वाचकांनो, की तुमचे संसार टिकावेत. छोटी छोटी बातोंमे इतना दम नही होता की घर टूट जाए ! खरं ना ?

लेखिका : डॉ. विजया वाड. 

प्रस्तुती : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कल खेल में हम हो न हो — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

??

☆ कल खेल में हम हो न हो — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

मॉर्निंग वॉक ला गेलो होतो, तळ्याला चार फेऱ्या मारल्यावर बसलो, तेवढ्यात बाजूनी आवाज आला.“काय रे मन्या, आज कवळी विसरलास का रे!”

खणखणीत आवाजातले हे वाक्य ऐकलं आणि गर्रकन मान वळवली. तळ्याच्या काठावर आठ दहा, सत्तर ऐंशीच्या घरातले तरुण बसलेले, आणि बरमुडा आणि टी शर्ट घालून येणाऱ्या मन्याकडे बघून फिदीफिदी हसत होते.

मन्या त्यांना म्हणाला, ” हसा लेको, ज्याची जळते त्यालाच कळते, यु एस ला गेलो होतो, येताना कवळीच विसरलो, पाठवलीय मुलानं कुरियरनी पण अजून आली नाहीये. तीन दिवस झाले पेज खातोय. तुम्हालाकाय होतंय खोटे दात काढायला.”

तेवढ्यात एक लेंगा आणि सदरा घातलेले आजोबा उठले आणि लटक्या रागानं म्हणाले, ” खोटे दात काय रे, हे बघ” म्हणत बोळक उघडलं, तर टेडी बिअर सारखे दोन दात लुकलुकत होते, बाकी सगळं वाळवंट!

“दात दोनच असले तरी कडक बंदीचा लाडू खातो अजून.”

“खातोस की चघळतोस रे”

ख्या ख्या, करून सगळे हसले.

“नान्या चघळतोस तू लेका. काल घरी जाताना चार शेंगदाणे तोंडात टाकलेस, ते संध्याकाळी देवळात आलास तरी चघळतंच होतास. ह्ये ह्ये ह्ये.

“हाट, ते साखर फुटाणे होते देवळातले !”

असे मस्त संवाद चालू होते.

मग नादच लागला मला रोज त्यांच्या गप्पा ऐकण्याचा.

जवळपास पाच सहा महिने झाले असतील मला त्यांच्या गप्पा ऐकता ऐकता. पण कधी कोणाची कुरबुर ऐकली नाही.

फक्त नोटबंदी झाली त्यावेळेस, नाना तावातावाने, भांडले होते.

“शिंच्या त्या मोदिने माझं पितळ उघडे पाडलन, बायको पासून लपवून ठेवलेले दोन हजार रुपये काढायला लाविलें हो ”

“मॅग, लापवायचे कशाला म्हणतो मी! मी बघ निघताना बायको पुढे रोज भिक्षांदेही करतो, ठेवते २०/२५ रुपये हातावर, तेवढीच आपली विडी काडीची सोय! काय?

एक दिवस अचानक सगळा च्या सगळा ग्रुप गैरहजर!

त्यानंतर माझ्या कामामुळे मला दोन तीन दिवस जमलं नाही, चौथ्या दिवशी गेलो तर सगळे हजर!

त्यातल्या तात्यांना विचारलं, “काय हो परवा कोणीच आला नाहीत?”

तर थेट अंतु बर्व्या स्टाईल उत्तर नानांनी दिले.

“अरे, मन्याची ट्रान्सफर झाली ना! त्यालाच सोडायला गेलो होतो”

“कुठे??”

अरे कुठे म्हणून काय विचारतोस, स्वर्गात! ”

त्याच्या महायात्रेला गेलो होतो सगळे!”

“काही म्हणा मन्या भाग्यवान हो! लेक अमेरिकेतून येतो काय, हाटीलात जाऊन पार्टी करतात काय, घरी येऊन झोपतो काय, आणि मुलगा उठवायला गेला तर हा मन्या केव्हाच गेलेला, स्वर्गाचं दार वाजवायला, रंभेच्या मागं!”

बाकी सगळे खिन्नपणे हसले.

मी म्हंटलं, ” तात्या इतकं लाईटली घेताय?”

“अरे तू, आता आलास, आधी आम्ही सव्व्हीस जणं होतो, आता बाराच उरलोय! तेही ऐशी नव्वदीचे! विकेटी पडायच्याच रे. आणि म्हणून रडायचं कशाला, दोन दिवस दुःख वाटतं, पण जन पळभर म्हणतील हाय हाय म्हणून सोडून आपलं रुटीन चालू करायचं!”

एकदम काहीसं आठवून मला म्हणाले,” तू केटरिंग करतोस ना रे! तुझा नंबर दे, मन्याच्या मुलाला देतो, तेराव्याची ऑर्डर देईल तुला!”

मी डोक्याला हात लावला, ते बघून अजून एक आजोबा म्हणाले,” अरे आपल्या सगळ्यांच्याच मुलांना देऊया याचा नंबर, वर्षभरात अजून दोन चार तरी विकेट पडणार!” ख्या ख्या ख्या!

दोन दिवसांनी मी जरा घाईत होतो, तेवढ्यात तात्यांनी हाक मारली,” ओ केटरर जरा इकडे या,आज संध्याकाळची ऑर्डर घेणार का पार्टीची!”

“पार्टी?”

“अरे नान्याच्या सेंच्युरी ला फक्त अकरा वर्ष उरलीत!”

माझा प्रश्नार्थक चेहरा बघून मला म्हणाले,” एवढा कसा बावळट रे, आज नान्याचा एकूणनव्वदावा प्रकटदिन आहे,

फार काही नको, मस्तपैकी लुसलुशीत उपमा, आणि चहा, बारा प्लेट”

“बास एवढंच ना? दिलं!”

“आणि हो, कडक बुंदीचे पाच लाडू! आज बघतोच कसा खातो ते,

आणि हो! उपमा जास्त तिखट नको हो, हिरड्या झोंबतात नंतर, आणि त्यात उडदाची डाळ बिलकुल नको, कवळी खाली जाऊन बसते, मग जीव जातो काढताना!”

संध्याकाळी ऑर्डर द्यायला गेलो आणि चकित झालो, सगळे थट्टा मस्करी करीत बसले होते. मन्याच्या फोटो समोर काही चाफ्याची फुलं होती, आणि मोठमोठ्यांदा गाणं चालू होतं.

“जिंदगी एक सफर है सुहाना, यहा कल क्या हो किसने जाना!”

मला बघून सगळे थांबले, तात्या पुढे झाले, उपम्याची मुद एकेका बशीत वाढून घेतली, चहा कपांत ओतला, सगळे उभे राहिले आणि “लॉंग लिव्ह नान्या, थ्री चिअर्स फॉर नाना, हिप हिप हुरर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे! करत चहाचे कप, एकमेकांवर आदळून पुन्हा दुसरं गाणं सुरू!

मी काहीश्या संभ्रमावस्थेत घरी आलो आणि विचार करू लागलो, आज आपण आपल्या कट्ट्यावर भेटतो, पण आपल्या आयुष्याच्या तिन्हीसांजेला असेच हसतमुख, इतकेच जिंदादिल असू का? ह्या म्हाताऱ्यांइतकीच तरुणाई आपल्यात असेल??

असायलाच हवी!

आणि एकदम त्यांच्या पार्टीतलं मी निघतानाचं गाणं ओठावर आलं,

“कल खेल में, हम हों न हों

गर्दिश में तारे रहेंगे सदा

भूलोगे तुम, भूलेंगे वो

पर हम तुम्हारे रहेंगे सदा

रहेंगे यहीं, अपने निशाँ,

इसके सिवा जाना कहाँ

जी चाहे जब हमको आवाज़ दो

हम हैं वहीं, हम थे जहाँ

अपने यही दोनों जहां

इसके सिवा जाना कहाँ

जीना यहा मरना यहा,

इसके सीवा जाना कहा !!”…

लेखक : अज्ञात

(संकलन: स्पंदन टीम)

प्रस्तुती : श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ उणीवेची जाणीव… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? मनमंजुषेतून ?

 ☆ उणीवेची जाणीव… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे

*…”Make imperfection as the new defination of perfection “.

वरची ओळ मी काही कुठ वाचलेली नाही बरं का…. माझ्या रोजच्या जीवनात मला अनेक वेळा पडणारा प्रश्न आहेआणि खरच मला रोज वाटत मी बऱ्याच गोष्टीत कमी आहे हे कमी असणं नाही का चालणार?

म्हणजे बघा आजूबाजूला प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीत perfect च व्हायचं आहे…

अगदी Nursery मधल्या आईबाबांना सुद्धा मुलांनी इंग्लिश मध्येच बोलायला हवंय..त्याचे बोबडे बोल सुद्धा त्यांना इंग्लिश मध्येच ऐकायचे आहेत त्याच्या बोबड्या बोलानी त्यांनी जर मातृभाषेत संवाद केला … एखाद बडबड गीत म्हटल तर नाही का चालणार? त्यामुळं तुमच आणि त्याच्या बालमनावर च दडपण कमीच होणार आहे…इतर मुलांप्रमाणे त्याने नाही परफेक्ट इंग्लिश बोललं तर नाही का चालणार?

आज सोशल मीडिया वर प्रत्येक जण माझे लाईफ किती perfect आहे…मी किती आनंदात आहे हे दाखवण्या च्या धडपडीत असलेला आपण पाहतो

त्यापेक्षा तुमच्या संपर्कामधल्या मित्र मैत्रिणीना कळु द्या की …बाबारे ! माझ्या लाईफ मध्ये पण problems आहेत .. माझं लाईफ पण तुमच्या सारखच imperfect आहे .. मी अमुक एका problem मधून जात आहे… हे मोकळे पणाने मित्रात, नातेवाईकांना…. सांगा नक्कीच दडपण कमी होऊन एखादा मदतीचा हात समोर येईल… कौन्सिलर ची महागडी मदत घ्यावी लागणार नाही.

मी कमी पडतोय …हा problem …सोडवण्यासाठी ही कबुली दिली एखाद्या जवळ तर नाही का चालणार?

अहो आपण काही सिनेमा मधल्या नट नट्या आहोत का पन्नाशी मध्ये सुंदर दिसायला?… मग कशाला ते filters च दडपण? चार मैत्रिणी समोर कमी सुंदर दिसलो तर नाहीं का चालणार?

पन्नाशी मधला charm वेगळाच असतो तो अनुभवा ! एन्जॉय तर करा एकदा….पहा जमतंय का…

प्रत्येक स्त्री घराबाहेर जाऊन किंवा घरून काहीतरी करून पैसे मिळवते….मी मेली मात्र नुसती घरातच असते!! असं वेळोवेळी मनाशी बोलून मनाला नाही दुखावलं तर नाही का चालणार? या उलट ज्या  कामाचा मला पगारही मिळत नाही ते काम मी तितक्याच उत्साहाने रोज करते आणि माझ्यावर आप्रेजल च दडपणही नाही अस  सांगा मनाला हवे तर!!   नाही का चालणार?

माझ्या मुलाला इतर मुलांप्रमाणे खुप चांगले मार्क्स मिळत नाहीत पण तो खुप भावनिक आहे… माझ्या चेहर्या वरील रेष जरी बदली तरी त्याला समजत… माझ्या घरकामाची, बाबांच्या मेहनतीची तो दखल घेतो… कधी विचारलं त्याला काय खाशील?… तर तुला जे सोप्पं वाटेल ते कर अस  म्हणतो….हे चांगल्या मार्क्स इतकचं सुखावणारं आणि महत्वाचं  वाटतं नाही का? माणूस म्हणून तो उत्तम घडला आहे मग त्याला कमी मार्क्स मिळाले तर नाही का चालणार ?

अजून किती वर्ष आपण ससा आणि कासवाची गोष्ट सांगून शर्यत या गोष्टीला glorify करणार आहोत

शर्यत ही गोष्टच वजा केली तर जीवन किती सुखकर होईल कल्पना करा!!!!!

फ्रस्टेशन, डिप्रेशन हे शब्द डिक्शनरी मध्येच राहू द्या ना

जीवनात नाही आले तर नाही का चालणार?

मला सर्वांसमोर जाऊन बोलता येत नाही  …पण चांगल ऐकायला आवडत हे बोलता येण्याइतकचं महत्वाचं आहे  …मी फक्त मन लावून ऐकल तर नाही का चालणार?

माझा मुलगा वेगवेगळ्या क्लासेस ला जातो या पेक्षा संध्याकाळी त्याला आवडेल ते दोन तास खेळतो

तो All rounder नाही पण खुप आनंदी आणि खट्याळ आहे ही गोष्ट  सांगताना आभिमान वाटायला हवा नाही का ?

मी काही प्रथितयश लेखिका नाही …. चार मनातल्या गोष्टी तुमच्या समोर मांडल्या तर नाही का चालणार?….

परंतु पुन्हा तेच… खुप रंजक लिहिता नाही आल तर नाहीं का चालणारं?—- फक्त भावना व्यक्त केल्या तर नाही का चालणार? 

धन्यवाद!!

लेखक : अज्ञात

संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares