मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ असाही एक भीतीदायक अनुभव… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

??

☆ असाही एक भीतीदायक अनुभव… ☆ सौ. वृंदा गंभीर

ही कथा नसून माझ्या जीवनातला एक भयानक अनुभव आहे. माझं नावं प्राजक्ता संजय कोल्हापुरे. मी जेव्हा लहान होते तेव्हा मी सायकलवरून शाळेत जात होते. माझी शाळा होती आमच्या घरापासून जवळ जवळ 4km अंतरावर आणि शाळेत जाताना व घरी येताना मला फार दम लागायचा,

मला थकवा जाणवायचा पण वाटायचे सर्वांना होते त्यात काय वेगळं? म्हणून सारखं मी त्याकडे दुर्लक्ष करायचे. आई पण मला म्हणायची ‘ दिदू जेवणं वेळेवर करतं जा किती थकवा येतो तुला ‘ पण मी मात्र दुर्लक्ष करणार. पण त्याचे परिणाम पुढे जाणवतील हे कुणालाच लक्षात आले नाही. मी मोठी झाले पण माझा हा त्रास कुणाच्याच लक्षात आला नाही. ४ वर्षाखाली माझी आई वारली. तिने आत्महत्या केली, सगळे जण म्हणतात मी फार रडलेच नाही. पण  माझं फार प्रेम होत तिच्यावर म्हणून मला फार आठवण यायची.  ती गेल्यावर मी एकटीच असायचे घरी, मी फार रडतच नव्हते त्यामुळं सर्व त्रास मी निमूटपणे सहन केला, भावनाहीन झाले होते. 

मग मला स्थळ आले. मलवडीमध्ये दाखवण्याचा कार्यक्रम अगदी उत्साहात झाला.  माझं एक वर्षाखाली धूमधडक्यात लग्न झालं, आणि तेही माझ्या आईच्या पुण्याईने.  तिने माझ्यासाठी करून ठेवलेले सोने माझ्या उपयोगाला आले. स्वामींच्या आशीर्वादाने खूप चांगले लग्न झाले. मला एक छान आणि सुंदर व्यक्तिमत्व असणारा नवरा मिळाला, आणि त्या कुटुंबातील माणसं फार चांगल्या स्वभावाची आणि निर्मळ मनाची होती,. मी झाले प्राजक्ता संघर्ष गंभीर, गंभीर घराची मोठी सून.  

सर्वजण  फार आनंदात होते, नित्य नियमाने सगळी कामे होत होती, कुलाचार पण चांगला होत होता.  पण आमच्या हसणाऱ्या कुटुंबाला कुणाची तरी नजर लागली. आमच्या घरी मामीच्या दोन मुली आल्या होत्या, नम्रता आणि गौरी. आम्ही सगळे शनिवारी पिक्चरला गेलो.  पिक्चर बघून घरी आलॊ तर आमचा फ्लॅट आहे तिसऱ्या मजल्यावर.  मी चढून वर आले तर मला थकवा जाणवायला लागला.  फार दम लागला ..  १० मिनिटे झाली पण माझा दम काही थांबेना. मागच्या आठवड्यात मी आणि माझे मिस्टर दवाखान्यात जाऊन आलॊ होतो तेव्हा डॉक्टर म्हणाले होते की ऍसिडिटी झाली आहे आणि त्यांनी मला गोळ्या दिल्या, पण माझा  त्रास काही थांबेना.  त्याच दिवशी रात्री मला फार त्रास झाला, मला नीट आणि पुरेसा श्वास घेता येत नव्हता.  आडवे झोपले कि श्वासाच प्रमाण कमी अधिक होत होते.  त्या दिवशी मी काही झोपले नाही, पण दुसऱ्या दिवशी मी आईंना सांगितले कि मला दम लागतोय मग त्या मला म्हणाल्या  कि, आपण दवाखान्यात जाऊ, मी टाळाटाळ केली, लक्ष दिले नाही.  मग मात्र आईने मागे लागून माझ्यावर रागवून मला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेलं.  तिथे त्यांनी टेस्ट केली आणि त्या टेस्टमध्ये कळले कि माझ्या छातीत पाणी झाले आहे.,आधी  एकदा होऊन गेले आहे आणि ते छातीत साठून चिटकून बसले आहे हृदयात. म्हणून मला श्वास घेता येत नव्हता. डॉक्टर म्हणाले लवकरात लवकर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावे नाहीतर मुलगी वाचणार नाही.  दुसऱ्या दिवशी मला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेले.  तिथे त्यांनी टेस्ट केली आणि मला ताबडतोब वोर्डमध्ये ऑक्सिजनवर ठेवले होते, आणि भीती घालण्यात आली होती कि ट्रीटमेंट लवकरात लवकर चालू करा नाहीतर मुलगी वाचणार नाही. ते डॉक्टर हृदयात होल पाडून पाणी काढणार होते, असा आहे प्रायव्हेट हॉस्पिटलमधला भोंगळ कारभार.  तिथे बिल तर फाडले जातेच पण भीती देखील दाखवली जाते.  या भीतीखाली रात्रभर कुणालाच झोप लागली नाही.  सगळे हॉस्पिटल मधेच होते पण तेवढ्यात त्यांना कुणीतरी कळवले कि मुलीला ससून हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा, तिथे चांगली ट्रीटमेंट केली जाते.  मला प्रायव्हेटवरून गव्हर्नमेंटमध्ये ऍम्ब्युलन्समधून न्यावे लागले. ऑक्सिजन लावलेलाच  होता.  असा अनुभव परत कधीच कुणाच्या वाट्याला येऊ नये. मी ससूनला आले.  फार गर्दी होती आणि बेडदेखील शिलक नव्हता.  कसाबसा बेड आरेंज केला.  मी त्रासाने कळवळत होती, त्यानंतर मला वरच्या हॉलमध्ये हालवण्यात आले.  सगळे जण घाबरून गेले होते मला अशा अवस्थेत पाहून आणि माझ्या आई तर फार रडत होत्या मला पाहून, कारण तशी भयानक दिसत होते मी त्या अवस्थेत! मला तिथून बाहेर काढून प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये हालवण्यावरून फार वाद झाले सासर कडच्यामध्ये आणि माहेर कडच्यामध्ये, पण शेवटी मला ससूनमध्ये ठेवण्याचा निर्णय पक्का झाला, कारण प्रायव्हेट मध्ये पैसे जास्त घेणार होते आणि शिवाय पायपिंग करून पाणी बाहेर काढणार होते, ससून मध्ये मात्र मला गोळ्यांनी बरे केले,

रोज मला दोन गोळ्या सकाळी आणि संध्याकाळी सुरु केल्या, स्टेरॉईड आणि इंजेकशन तर वेगळाच जीव घेत होते, आणि ऑक्सिजन आणि सलाईन वेगळेच, मी फार गळून गेले होते.  मात्र त्या 10 दिवसात जो अनुभव आला तो वैऱ्याला पण येऊ नये, कारण त्या दिवसात मला माझी माणसं कळली, कोण जवळचे आणि कोण परके सर्व दाखवलं स्वामी महाराजांनी.  माझे पाळीचे प्याड बदलण्यापासून माझी युरीन फेकण्यापर्यंतचे सगळे काम माझी सासू म्हणजेच दुसरी आई करतं होती.  शेवटी काय, ” परदु:ख शितळ असतं ” असे सर्वांना वाटतं असेल , असो.  आईने कधीच मला सून म्हणून ट्रीट नाही केले.  तिथे असणारे सर्व पेशन्ट आणि त्यांचे कुंटूब जेव्हा आम्हाला पहायचे  तेव्हा त्यांना नवलच वाटत होते, जेव्हा आई माझी तेल लावून वेणी घालायचे, मला रोज गरम गरम जेवायला आणायची, तेव्हा सर्व म्हणायचे कि काय मुलीच नशीब, आणि आई नाही तर सासरे म्हणजेच बाबादेखील माझे ताट धुवून ठेवायचे तर सर्व फक्त माझ्या कडेच पाहायचे त्या दिवसात खूप dr लोकांनी खूप भीती घातली कि हे या लहान वयात होणे चांगले नाही.  खूपच वाईट वाटले कि ‘असे कसे झाले तुमच्या सुनेचं ‘ असे टोमणे देखील ऐकायला मिळाले.  मात्र माझी आई माझ्या सोबत होती आणि बाबा देखील.  त्या दिवसात मला एक देखील जवळचे नातलग भेटायला आले नाहीत, माझा भाऊ देखील मला अर्ध्यावर सोडून गेला निघून गेला, माझा सखा बाप पण मला पाहायला आला नाही कि माझी मुलगी कशी आहे? म्हणून.  फक्त मावशीचे mr भेटायला आले.  बाकीच्यांनी तर तोंड फिरवली होती.  मुलगी जिवन्त आहे कि मेली कुणाला काहीच देणं घेणं नाही आणि मी खुळी त्या दरवाज्याकडे नजर लावून होती कि कोणी तरी येईल भेटायला, पण देवाने माणसे मात्र दाखवली. 

त्या दिवसापासून ठरवलं कि सासरकडची माणसं आपली, कारण ज्या सख्या आईने जीव सोडला तरी दुसऱ्या आईने जीव वाचवला. आज ती नसती तर मी पार खचून गेले असते.  ती रोज तुळजाभवानी मातेला प्रार्थना करायची, महाराजांना विनंती करायची कि माझ्या सुनेला घरी सुखरूप घेऊन ये, तिला पूर्ण बरे कर आणि तसेच झाले. त्यांनी माझ्यासाठी शुक्रवार धरले आणि कालभैरवाने  तिचे मागणे पूर्ण केले.  त्याला आईने साकडं घातलं होते कि सुनेला पूर्ण बरे कर आणि देवाने प्रार्थना ऐकली.  मी पूर्ण बरी झाले.  मला घरी आणण्यात  आले.  आज ही मी व्यथा मांडत आहे पण माझ्या डोळ्यातले अश्रू काही थांबायला तयार नाहीत.  तरी देखील हे सत्य मला मांडायचे होते कारण असं म्हणतात कि देव तारी त्याला कोण मारी……,

लेखिका : सुश्री प्राजक्ता संघर्ष गंभीर

प्रस्तुती – दत्तकन्या (सौ. वृंदा पंकज गंभीर)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ परफेक्ट — – लेखिका – अनामिका ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

??

☆ परफेक्ट — – लेखिका – अनामिका ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे 

सध्या ओ टी टी मुळे सगळं जग हातात आलं आहे. मला हव्या त्या देशातील हव्या त्या भाषेतील सिनेमे आणि सिरियल बघता येतात. आणि मला आवडतं निरनिराळ्या देशातले लोक, तिथल्या पद्धती, तिथला निसर्ग बघायला, त्यामुळे इंग्लिशमध्ये भाषांतर केलेल्या सिरीयल मी बघते. 

अशीच एक सिरीयल बघत होते, त्यात आजकालच्या स्त्रियांना किती ताण असतो, घरचं सगळं करून नोकरी करून मुलं सांभाळून शिवाय पुन्हा स्वतःच्या आवडीचं काही करायला कसा वेळ मिळत नाहीये यावर त्यातली पात्रं चर्चा करत होती…

मला ही चर्चा पाहताना पटकन असं वाटलं की ही गोष्ट किती ग्लोबल आहे… हाच संवाद आत्ता मुंबईत एखाद्या लोकलच्या डब्यात पण चालू असेल, जपानच्या बुलेट ट्रेन मध्ये किंवा अमेरिकेत एखाद्या कॅफेत सुद्धा सुरू असेल…

तेवढ्यात त्या चर्चेत सहभागी नसलेली पण शेजारच्या खोलीतून सरबत घेऊन आलेली एक आज्जी असते, तिला त्या सगळ्या जणी विचारतात की, “ए तू कसं मॅनेज केलंस गं सगळं? तूही कॅफे चालवत होतीस, तूही घरी येऊन पुन्हा सगळं काम करत होतीस, मुलांची शाळा अभ्यास, मोठ्यांचे आजार सगळं छान मॅनेज करत होतीस… तुला आम्ही कधीही थकलेलं पाहिलं नाही…” 

यावर ती आज्जीबाई छान गोड हसते आणि म्हणते, “मी थकत असे कधीकधी, पण मला ताण मात्र कधीही आला नाही… कारण मला पर्फेक्ट व्हायची भूक नव्हती… किंबहुना आमच्या काळी असं ‘पर्फेक्ट असं काही नसतं’ असं लोकांना मान्यच होतं… 

आई म्हटल्यावर ती चुरगळलेल्या ड्रेसमध्ये केस विस्कटलेली असू शकते… मुलांनी भरलेलं घर हे पसारा युक्तच असणार… चाळीशी पार केलेला मुलांचा बाबा, टक्कल असणारच त्याला… पर्फेक्ट असं काही नव्हतं आणि ते असावं असा अट्टाहास सुद्धा नव्हता त्यामुळे सोप्पं गेलं जरा तुमच्यापेक्षा…” पुष्कळ आत्मपरीक्षण करायला लावणारा प्रसंग आहे हा. 

का अट्टाहास करतोय आपण पर्फेक्ट असण्याचा आणि कुणासाठी?

जाहिरातीत दाखवतात तशी संध्याकाळी सुद्धा तरतरीत आणि केस सुद्धा वाकडा न झालेली आई प्रत्यक्षात नसते, कारण प्रत्यक्षातल्या आईला संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर गॅस जवळ उष्णतेची धग सोसत पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक करायचा असतो… सणाच्या दिवशी 12 माणसांचा स्वयंपाक आणि आदरातिथ्य करताना मेकअप आणि भरजरी साडी नाही सांभाळू शकत सगळ्या, त्या ऐवजी कुर्ता घातला असेल तर सरसर कामे करता येतात…

ऑफिसला प्रेझेंटेशन असेल त्यादिवशी घरी काम जरा बाजूला ठेवावेच लागणार आहे… मुलांच्या परीक्षा असतील तर आईनेच अभ्यास घ्यायचा असं कुठल्याही ग्रंथात सांगितलेले नाही… चित्रातल्या सारखं आवरलेलं घर हे फक्त चित्रात नाहीतर नाटक सिनेमातच असतं… 

स्वतःहून अभ्यास करणारी आणि पहिले नंबर वगैरे आणणारी मुलं तर मला वाटतं बहुधा फक्त स्वप्नातच असतात… कुणाचा तरी पहिला नंबर येणार म्हणजे इतरांचा दुसरा तिसरा चवथा पाचवा येणारच… अभ्यास छान करून घ्या पण नंबर येऊ दे की पंचविसावा… नोकरी देताना शाळेतला चवथी ब मधला नंबर कोण विचारतो?… 

तब्येत सांभाळावी हे ठीक पण पन्नाशीच्या बाईने पंचविशीतील दिसण्याचा अट्टाहास कशासाठी?… वजनाचा काटा आटोक्यात असावा जे ठीक पण ‘साइझ झिरो’ चा हट्ट कशाला? सगळ्यांना वन पीस चांगलाच दिसला पाहिजे हा हट्ट कशासाठी ? काहींची वळणे साडीमध्ये काय सुरेख दिसतात… टाचा मोडून पडतात की काय असं वाटेपर्यंत दुखावणार्‍या हाय हील कशासाठी टाच महत्वाची आहे की फोटो?…

मुळात या पर्फेक्शनच्या व्याख्या कोण ठरवते आहे?

ऑफिसला काय घालावे, घरी काय घालावे, कसे रहावे, कसे चालावे, कसे बोलावे, कसे दिसावे, कुठे फिरायला जावे, काय आणि कधी खावे, अगदी कुठल्या गादीवर आणि कसे झोपावे, सगळं काही ठरवण्याचे हक्क आपण मिडिया ला नेमके का आणि कधी दिले?

एक माणूस दुसर्‍या सारखं कधीही नसतं मग सगळ्यांना एकच व्याख्या कशी लागू होईल?

करा की मस्त भिंतीला तंगड्या लावून आराम… होऊ देत घराचं गोकुळ… अघळपघळ गप्पा मारा मुलांशी, नवर्‍याशी… मस्त मोठमोठ्याने गाणी म्हणत फिरा घरभर गबाळ्या अवतारात… आणि तेवढ्यात पाहुणा आलाच तर त्यालाही आग्रह करा गोष्ट सांगायचा… सध्या दुर्मिळ होत चाललेली कला आहे ती…

लेखिका- अनामिका

संग्राहिका आणि प्रस्तुती –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सप्रेम नमस्कार… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

??

☆ सप्रेम नमस्कार… ☆  श्री संदीप रामचंद्र सुंकले 

प्रिय विद्यार्थी/पालक बंधू भगिनी,

सप्रेम नमस्कार.

ईश्वर कृपेने आपण सर्वजण कुशल असाल.

मे महिन्याची सुट्टी संपतानाच निकाल लागायला सुरुवात होत असते. पूर्वी फक्त दहावी आणि बारावी यांना महत्व असायचे, आता त्यात निट, गेट अशा अनेक परीक्षांची आणि निकालांची  भर पडली आहे.

दहावी/बारावी ही वर्षे सर्व विद्यार्थी आणि पालकांच्या आयुष्यात महत्वाची मानली गेली आहेत, जात आहेत आणि पुढेही जातील. दहावी/बारावीची परीक्षा आणि त्यात मिळणारे गुण ही नक्कीच महत्वाचे आहेत, यात कोणाचे दुमत असण्याची गरज नाही, परंतु ही परीक्षा म्हणजे आयुष्याच्या शेवट आहे, यात कमी गुण मिळाले अथवा एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला तर त्याचे पुढील भवीतव्य अंधकारमय आहे असे मात्र बिलकुल समजू नये. ‘परीक्षा हा शिक्षणक्रमाचा एक भाग आहे’, इतकेच आपण ध्यानात घ्यावे. विद्यार्थ्याने स्वतःला तपासून घेण्याचा तो एक राजमार्ग आहे. समजा यावेळी कमी गुण मिळाले तर आपले नक्की काय चुकले याचा विचार करून, योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊन पुन्हा नव्या उमेदीने अभ्यास करावा.  

आयुष्याच्या लढाईत शाळेतील गुण फारच कमी वेळा कामास येत असतात.  जीवन जगण्याच्या पाठशाळेत शाळेतील गुणापेक्षा मनुष्याच्या अंगातील गुण जास्त उपयोगी पडतात. यातील प्रमुख गुण म्हणजे यश किंवा अपयशाला मनुष्य कसा सामोरा जातो. हा गुण ज्याने आत्मसात केला, तो जीवनाच्या शाळेत नक्कीच यशस्वी होऊ शकेल…

कमी गुण मिळवून पुढील आयुष्यात यशस्वी झालेली अनेक उदाहरणे आपल्याला ठाऊक असतील. पालकांनी इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी की मुले म्हणजे ‘मार्कांची factory’ नाही. आपण दहावी बारावीत किती गुण मिळवले होते, याचाही विचार करावा.

ज्यांनी परीक्षेत उत्तम यश मिळवले त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि ज्यांना तुलनेनं कमी गुण मिळाले किंवा जे अनुत्तीर्ण झाले त्यांना मानसिक आधार देण्यासाठी या पत्राचे प्रयोजन आहे.

आपण वाचावे, तसेच सबंधित व्यक्तींपर्यंत हे पत्र पोचेल असा प्रयत्न करावा ही नम्र विनंती.

आपला, 

दास चैतन्य 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जिलेबी…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “जिलेबी…” ☆ सुश्री शीला पतकी 

मी मुख्याध्यापक झाल्यानंतर माझे ऑफिस दहाला सुरू होत असे. मी क्लार्क आणि सेवक यांचे काम दहा पासून सुरू होत असल्यामुळे आमचं लंच टाईम दुपारी दोन वाजता असे,

ज्यामुळे मुलींच्या मधल्या सुट्टीत मला त्यांच्याकडे लक्ष देणे सोयीचे जाईल. कारण त्यांची सुट्टी तीन वाजता होत असे. साधारणपणे डबा खाणा-या सगळ्या गटांमध्ये फिरून मुली डबा काय आणतात याचे मी निरीक्षण करत असे. बिस्किट, वेफर्स, चुरमुरे असे देणाऱ्या पालकांना मी पत्र देत असे किंवा बोलावून घेत असे आणि विद्यार्थिनींना पोळी भाजीचा डबा द्या असे आवर्जून सांगत असे. त्यांचे वाढीचे वय आहे तेव्हा त्यांना भरपूर आहार मिळाला पाहिजे.

या पद्धतीने मी वेगवेगळ्या गटात हिंडत असताना मग मुली आमचा एक घास घ्या ना बाई, आमचा एक घास घ्या ना, असा आग्रह करीत. त्याप्रमाणे जिच्या डब्यात अगदी साधं काही असायचं तो घास मी घेत असे.

सोलापुरात विशेषतः तेल-चटणी पोळी देण्याची पद्धत आहे. गरीब माणसांचे ते जेवण आहे. त्यामुळे बहुदा बऱ्याच वेळा मी तेल – चटणी पोळीवाला घास घेत असे.

हॉलच्या समोर एक मोठा गट बसलेला होता. पाचवी सहावीच्या विद्यार्थ्यांनी होत्या. आणि मी एका मुलीचा एक घास घेतला. तेव्हा मुलीने ओळखले ‘बाई तुम्ही तिची चटणी पोळी आहे म्हणून घेतलं ना, पण तिच्याजवळ अजून एक डबा आहे त्यात जिलबी आहे तो मात्र ती काही काढत नाही.

मी म्हणाले ‘चल असं कुठे असता कां ?’ती म्हणाली ‘बाई तिला विचारा तिच्या मांडीखाली एक डबा आहे. आणि ती मुलगी रडायला लागली.

इतक्यात बेल झाली आणि ऑफिसमध्ये मला फोन आला म्हणून बोलावणे आले. मी ऑफिसात गेले एस.एस.सी. बोर्डाचा फोन होता त्यामुळे मी त्या कामात गर्क होते.

मधली सुट्टी झाल्यामुळे मुली वर्गात गेल्या. सगळीकडे शांतता पसरली आणि एक मुलगी माझ्या ऑफिस बाहेर हमसून हमसून रडताना मला तिचा आवाज ऐकू आला.

मी कामात बिझी होते. मी दरवाज्या वरील माझे सेवक शिवा यांना हाक दिली. म्हणाले ‘शिवा काय चाललंय, कोण रडतंय.’

तेव्हा ते म्हणाले. ‘बाई एक मुलगी तुम्हाला भेटायचं म्हणते आणि खूप रडत आहे.’

‘ठीक आहे पाठवा.’ मग तीच ती मुलगी आत आली आणि माझा हात हातात घेऊन म्हणाली ‘बाई नाही हो मी तुम्हाला मुद्दाम जिलेबी दिली नाही असं नाही.

मला खरंच वाटायला लागलं. मी म्हणलं ‘काही हरकत नाही. तुला ती जिलबी खायची होती कां ?’ मी अगदी सहज म्हणाले आणि ‘अगं जे असेल डब्यात ना ते सगळ्यांनी वाटून खावं बाळा.’

त्यावर तिने जे उत्तर दिलं ते असं होतं.

ती म्हणाली ‘बाई माझी आई एके ठिकाणी घर कामाला जाते. त्यांच्या घरी आज काही कार्य होते. त्यांनी माझ्या आईला वाढून दिलेले जे ताट होते ते आई घरी घेऊन आली आणि तो दुसरा डबा तिने मला दीड वाजता आणून दिला त्यामध्ये जिलबी होती. पण त्याला भात लागलेला होता. त्यामुळे ते खरकट्या सारखं वाटत होतं. मला वाटलं न जाणं कोणाच्या पानातील असेल तर म्हणून मी ती जिलबी कोणालाच दिली नाही.’

आणि ती माझ्या कमरेला मिठी मारून अजूनच रडायला लागली. हे ऐकून माझे डोळे भरून आले. इतकेच काय आमचे सेवक शिवाजी कांबळे सुद्धा रडायला लागले. त्यांनी पटकन दार बंद करून पडदा सारखा केला.

मी खुर्चीवरून उठले. त्या मुलीला जवळ घेतलं आणि म्हणाले ‘बाळा या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे शिक्षण होय. तू खूप शिक आणि तुझ्या आईला सुखी कर. तुला शिक्षणाला जी कुठली मदत लागेल ती सेवा सदन शाळा, व्यक्तिशः मी कधीही करायला तयार आहोत. पण मन लावून अभ्यास कर आणि काही तरी बनण्याची जिद्द ठेव.’

नंतर तिची समजत घालून मी तिला पाठवून दिले. मला जाणवले की तिला लक्षात येत होते .. कुणीतरी वाढून दिलेलं ताटातलं अन्न आपण खातो आहोत. एवढ्या कोवळ्या जीवाला हे कळणं फार वाईट होतं. पण परिस्थिती पुढे इलाज नव्हता.

ही गोष्ट माझ्या मनात कुठेतरी खोल रुतून  बसली. त्यानंतर सोलापूर आकाशवाणी वरती ‘गाणी मनातली’ या सदरामध्ये अनेक स्त्रियांच्या मुलाखती झाल्या. त्यामध्ये एखादं गाणं लावायचं आणि ते आपल्याला का आवडले त्याच्या मागची घटना, प्रसंग हे सांगणे… असा तो कार्यक्रम होता.

त्याचे प्रसारण रात्री दहा वाजता होत असे त्या कार्यक्रमां मध्ये पाच एक गाणी मी लावली आणि ती गाणी मला कां आवडली असे प्रसंग सांगितले. त्यामध्ये मी हा प्रसंग सांगितला आणि त्यानंतर ‘नन्हे मुन्ने बच्चे तेरी  मुठ्ठी में क्या है…’ हे गाणं लावण्याची मी विनंती केली.

त्या घटनेचा प्रभाव लोकांवर एवढा पडला की रात्री साडे अकरापर्यंत मला लोकांचे फोन येत होते- ‘किती मनाची पकड घेणारा प्रसंग आहे, आम्ही रडलो…’ असं लोक सांगत होते.

कार्यक्रम खूपच छान झाला होता.

त्यामध्ये साहित्यिक संपादक मा अरविंद जोशी सरांचा फोन आला. ते मला म्हणाले ‘तुम्ही शिक्षक असल्याचा मला आज हेवा वाटला.’

आणि हे वाक्य माझ्यासाठी त्या कार्यक्रमाची पावती ठरलं. त्यानंतर या प्रसंगावरती एखादी शॉर्ट फिल्म करावी असे माझ्या डोक्यात होते. सुमारे चौदा-पंधरा वर्षानंतर मी माझ्या एका शिक्षक मित्राला ही गोष्ट ऐकवली. त्यांनी त्याची पटकथा लिहून आणली. शिक्षणाचे महत्व पटवून देणारा एक प्रसंग त्याला जोडला आणि ‘जिलबी’ नावाचा लघु चित्रपट तयार झाला. त्यामध्ये डॉक्टर माननीय निशिगंधा ताई वाड यांनी मुख्याध्यापकाची भूमिका केली. विद्यार्थिनींच्या भूमिका इतर काही मुलींनी केल्या होत्या.

निशिगंधाताईंनी जेव्हा या चित्रपटाची पटकथा ऐकली तेव्हा त्यांचे ही डोळे भरून आले आणि तात्काळ त्यांनी या लघुपटात काम करण्यासाठी संमती दिली होती. या लघुपटाचे काम पूर्ण झाले. त्यानंतर हा लघुपट अनेक फिल्म फेस्टिवल मध्ये दाखल झाला. त्यात त्याला सहभाग मिळाला आणि त्याला बरीच पारितोषिके मिळाली.

त्यातल्या कथेला पारितोषिक मिळालं.  मुख्याध्यापकाची भूमिका करण्याला निशिगंधाताईंना पारितोषिक मिळालं. विद्यार्थिनीची भूमिका करणाऱ्या मुलीला पारितोषिक मिळालं. दिग्दर्शकाला पारितोषिक मिळालं आणि फिल्मला पारितोषिक मिळालं. किमान पाच-सहा ठिकाणी या फिल्मला पारितोषिके प्राप्त झाली. याशिवाय बर्लिन येथील फिल्म फेस्टिवल मध्ये या लघुपटाची निवड झाली. मेलबर्न ला या फिल्मचे स्क्रीनिंग झाले. मुलांच्या भावविश्वातली वेगळी फिल्म म्हणून त्याला त्या ठिकाणी दाखवण्यात आले आणि सगळीकडेच या लघुपटला खूप गौरवण्यात आले. वृत्तपत्रांनी याच्यावरती भरभरून लिहिले.

अशा पद्धतीने एका छोट्या प्रसंगाचा हा एवढा मोठा चित्रपट उभा राहिला.

प्रसंग खूप घडत असतात. टिपणारा माणूस हवा. इतके खरे सेवा सदन शाळेच्या प्रांगणात घडणाऱ्या अशा अनेक घटनांनी वक्ता म्हणून माझी अनुभव समृद्धी वाढवली यात शंका नाही.

(माणसाने पूढील आयूष्यात कितीही श्रीमंती आली तरी आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून ठेवायचे असतात. परिस्थिती बदलते पण लहानपण सदैव आठवत रहातं.. अगदी जीवनाच्या अंतापर्यंत..) 

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “वळवाचा पाऊस असाही…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “वळवाचा पाऊस असाही…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

एप्रिल महिन्यातलं कडक ऊन.. पारा चढलेला ..अंगाची लाहीलाही..जोरात  फॅन सुरू केला तरी उकडतच होत.

काही वेळानंतर थोडं थोडं वातावरण बदलायला लागलं. हळूहळू वारा वहायला लागला. अचानकच काळे ढग दिसायला लागले. अंधारून आल्यासारखं झालं .आता तर वाऱ्याचा जोर फारच वाढला. झाडांच्या फांद्या हलायला लागल्या.  धप्प धप्प आवाज करत दोन नारळ पडले. एक झावळी पण सुसू आवाज करत पडली..

फांद्या पुढे पुढे येत होत्या ..

त्या पावसाला आनंदानी हसत हसत  ” ये ये “म्हणत आहेत असंच मला वाटायला लागलं …

वातावरण बदलूनच गेलं …

आलाच पाऊस वळवाचा… कोसळायलाच लागला ..बराच वेळ  धो धो पाऊस बरसला .

काही वेळातच आला तसा  निघूनही गेला…….

वातावरण शांत झाले .पाणी रस्त्यावरून वहात होते .खिडकीतून मी बघत होते .

बाहेर पडायचा  मोह झालाच ..गेले..  मुलं जमली होती .शेजारच्या बिल्डींग मधल्या आंब्याच्या झाडाच्या खाली खूप साऱ्या कैऱ्या पडल्या होत्या .पोरांना भलतीच  मज्जा वाटत होती .मुलं कैऱ्या गोळा करायला लागली. 

काही कैऱ्या फुटल्या होत्या, काही पाण्यात चिखलात पडल्या होत्या ,रस्त्यावर सोसायटीच्या झाडांमध्ये पडल्या होत्या.

 मुलांना फार गंमत वाटत होती.

” मला मिळाली ” “मला पण सापडली”

” अरे ही एक बघ केवढी मोठी आहे “

पोरं ओरडतच होती. एकाने चार कैऱ्या मला दिल्या .आजूबाजूचे लोकही जमा झाले होते .त्यांनाही त्या मुलांनी कैऱ्या दिल्या .खूप धमाल चालली होती .गार हवा आता फार सुखकारक वाटत होती.

इतक्यात माझं लक्ष तिच्याकडे गेलं. शेजारच्या बिल्डिंगमध्ये नुकतेच ते लोक  राहायला आले होते .

पोरांनी दिलेल्या कैऱ्या तिच्या हातात होत्या. त्यांच्याकडे बघत ती उभी होती .डोळे भरून वाहत होते. जवळ जाऊन  विचारलं ..

“काय झालं  ग?”

तिचा चेहरा रडवेला झाला होता. ती म्हणाली …

“सासऱ्यांचा सकाळीच फोन आला होता .असाच पाऊस काल आमच्या शेतातही पडला  म्हणे.आंब्याचं खूप नुकसान झालं आहे .पीकं तर पार आडवी झाली आहेत.”

आता तर तिचा बांधच फुटला .ती फारच जोरात रडायला लागली ….

मी नि:शब्द झाले ..काय बोलायचं याच्यावर ? सांत्वन तरी कसं करायचं? मला काही समजेना..

ती पुढे म्हणाली

” नको तेव्हा हा वळीव येतो आणि काही तासातच  हाता तोंडाशी आलेला घास घेऊन जातो”

मी नुसती उभीच..

” नको मला या कैऱ्या “

असं म्हणून तिने त्या कैऱ्या माझ्या हातात दिल्या .आणि शेजारच्या जीन्यानी वर निघून गेली.

इतका वेळ मी वरवर झाडाकडे पाहत होते …

आता खाली बघितलं मगाशी ती पुढे येणारी फांदी कदाचीत पावसाला

” थांब थांब ” म्हणत असावी का?…

अस आता मला वाटायला लागलं…

प्राप्त परिस्थितीचा आम्हाला हवा तो अर्थ आम्ही काढतो. वास्तव  वेगळं असतं  का?

अर्धा किलो कैरी मंडईतून आणणारे आम्ही … तेवढाच आमचा संबंध..त्याच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांचे दुःख आमच्यापर्यंत पोहोचतच नाही … हे आज स्पष्टपणे कळलं..

मोठ्या ब्रॅण्डेड दुकानात वस्तूची जी किंमत असेल ती आम्ही देतो. आणि भाजी घेताना मात्र दहा वीस  रुपयांसाठी घासावीस करतो.

आज तिच्यामुळे थोडी तरी भावना मनात जागी झाली .

असाही एक वळवाचा पाऊस विचार करायला लावणारा..

खरं सांगू तेव्हापासून पूर्वी इतका वळीव आता आनंदाचा राहिलेला नाही .

असा पाऊस आला की आता आठवतो तो  कष्ट  करणारा शेतकरी  

त्याच शेत ….

तिचा रडवेला चेहरा..

आणि खूप काही….

कधी आम्ही शहाणे होणार कोण जाणे… पण निश्चित विचार करूया आणि थोडं बदलूया…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डोन्ट मिस युवर पॉवर — ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

डोन्ट मिस युवर पॉवर — ☆ श्री सुनील देशपांडे

आपल्या जीवनात सगळ्यात पॉवरफुल शब्द कुठला असा प्रश्न जर मला विचारला तर मी उत्तर देईन

‘अहोss’ ……. 

या शब्दाचं सामर्थ्य जाणून असलेल्या पिढीचा सध्या अस्त होत आहे. खरं म्हणजे हा शब्द, स्त्रीप्रधान संस्कृतीचा मेरुमणी आहे. 

या शब्दात असं काय आहे ? असं विचारण्यापेक्षा या शब्दात काय नाही असे विचारणं जास्त संयुक्तिक ठरेल…… 

….. यात प्रेम आहे, यात धाक आहे, यात जरब आहे, यात आजारी माणसाची अगतिकता आहे, मदत याचना आहे,  आज्ञा आहे, यात सर्व काही आहे. ही नुसती एक हाक सुद्धा आहे.   हा शब्द उच्चारल्यानंतर ज्याच्यासाठी हा उच्चारलेला असतो, ती व्यक्ती हातातलं सगळं काम सोडून धावत सुटते.

यामधली भावना, हा शब्द उच्चारण्याची पद्धती आणि स्वर यावर अवलंबून असते. या मधला अर्थ उच्चारणाऱ्याला आणि ज्याच्यासाठी उच्चारला आहे त्याला त्या दोघांनाच निश्चित समजतो.

यात परिचय ही आहे. हो, कुणाशीही परिचय करून देताना – ‘हे आमचे अहो’ असा परिचय करून दिल्यानंतर घरातील संपूर्ण परिस्थितीची जाणीव समोरच्याला येते.

हे माझे मिस्टर – हे अगदीच नाटकी वाटतं.  हा माझा नवरा – हे वाक्य तर इतकं रुक्ष वाटतं की,  कडक उन्हाळ्यात  तापलेल्या डांबरी रस्त्याच्या बाजूच्या वठलेल्या संपूर्ण निष्पर्ण वृक्षा सारखं वाटतं. 

अलीकडच्या मुलींना अर्थात आमच्या पिढीतील सुद्धा नवऱ्याला नावाने हाक मारणाऱ्या मुलींना या शब्दाच्या सामर्थ्याची कधी कल्पनाच आलेली नाही. त्यामुळेच अलीकडच्या मुलींनी घरामध्ये स्वतःचं महत्व कमी करून घेतल्याचे जाणवते. 

माझ्या बायकोने जर मला ‘अरे सुनील जरा इकडे ये’ असे सांगितले असते तर मी तिला उत्तर दिले असते ‘हो थोड्या वेळाने येतो’ . पण ती जेव्हा अहोss  म्हणते त्या वेळेला होss चा शेवटचा हेल  संपायच्या आत मी हजर असतो.  

प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र सुद्धा ‘अहो ss  मला हरणाचं कातडं आणून द्या ना!’ असं म्हटल्या म्हटल्या लगेच धनुष्यबाण घेऊन त्या हरणा मागं धावले असतील, क्षण सुद्धा वाया घालवला नसेल. नाहीतर खरं म्हणजे त्यांनी लक्ष्मणाला सांगायला पाहिजे होतं की ‘जा रे त्या हरणाची शिकार करून ये’ पण नाही, ते अहो ऐकलं आणि सगळं संपलं! 

प्रभू रामचंद्रांसारख्या ईश्वरीय व्यक्तिमत्त्वाला सुद्धा खरं म्हणजे चुकीच्या वेळेला, चुकीचं कृत्य करण्यासाठी भाग पाडणारा तो शब्द किती सामर्थ्यवान असेल त्याची कल्पना करा! 

हा शब्द म्हणजे विवाहित स्त्रीचे घरातलं सामर्थ्य आहे. 

नवीन पिढीतील सर्व तरुणींना प्रेम विवाहित असो किंवा लिव्हइन मधील सुद्धा, माझी एक विनंती आहे.  एकदा अहोss हा शब्द प्रयोग वापरून तर पहा. त्याच्या सामर्थ्याची तुम्हाला एकदा कल्पना आली तर आपण काय मिस करत होतो याची कल्पना येईल. 

© श्री सुनील देशपांडे.

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य – एक नाटक ? .. की एक खेळ ? – भाग-२ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य – एक नाटक ? .. की एक खेळ ? – भाग-२ ☆ डॉ अभिजीत सोनवणे

वैद्यकीय

  1. रस्त्यावरच भिक्षेकर्‍यांना वैद्यकीय सेवा देऊन त्यांच्या विविध तपासण्या करत आहोत, वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये गंभीर रुग्णांना ऍडमिट करून त्यांच्यावर उपचार करत आहोत. पाय कापणे, छातीतून/ पोटातून पाणी काढणे, डोकं फुटणे, चेहऱ्यावर ब्लेड मारून गाल कापला जाणे, डोळ्यांचे /कानाचे ऑपरेशन करणे… वगैरे वगैरे….आता याविषयी फार चर्चा करत नाही… मी याविषयी एकही फोटो कधीही शेअर केला नाही….कारण ते वाचुन, फोटो पाहून, अनेक जणांना चक्कर येते, मळमळ होते….!

—- असो, तर अशांना बरं झाल्यानंतर आपण छोटा व्यवसाय टाकून देत आहोत; अर्थातच तुमच्या मदतीतून….हा मूळ मुद्दा… !  यातून बरं झाल्यानंतर आपण अशा लोकांना त्यांच्या मूळ गावी परत पाठवतो. जाण्याचा खर्च, तसंच तिथे सुरुवातीला राहण्याचा आणि व्यवसाय सुरू करण्याचा खर्च आपण करता….आपण म्हणजे “आपण”….मी नव्हे….!!! – करता आपणच….मी फक्त “सांगकाम्या”….!!!

एखाद्याकडून घेतलेली गोष्ट, दुसरीकडे पोचवायला काय अक्कल लागते….???

  1. अपंग असणाऱ्या माझ्या एका बंधूला व्हीलचेअर हवी होती….मी मग एक मेसेज टाकला आणि 223 व्हीलचेअरच्या मला ऑफर आल्या….

एक अपंग आजी….जिचे पती अपंग होते आणि नुकतेच ते गेले, त्यांच्या स्मरणार्थ त्या आजीने मला त्या बाबांची व्हील चेअर देऊ केली…

या आजीची भावना समजून घेऊन, त्यांच्याकडून आपण व्हीलचेअर घेतली आणि इतर सर्वांना नम्रपणे सांगितले की पुढे कधी लागली तर तुमच्याकडून घेतो…

काय म्हणू मी समाजाच्या दातृत्वाला ? 

दरवेळी आम्ही समाजाच्या पायावर कपाळ टेकतो….पण तरीही ते कमीच आहे… ! 

शैक्षणिक

भीक मागणाऱ्या पालकांच्या ५२ मुलांचे आपण शैक्षणिक पालकत्व घेतलं आहे.

….मला सांगायला आनंद होतो की आपल्या सर्वांच्या मदतीमधून, ज्या मुलांचे आपण पालकत्व स्वीकारले आहे, अशी सर्व मुलं यावर्षी उत्तम गुणांनी पास झाली आहेत….मुद्दाम मी काही गुणपत्रिका इथे शेअर करत आहे,..! 

माझ्या एका मुलीला नववी मध्ये तर 92% मार्क पडले आहेत….पहिलीपासून दहावीपर्यंतची माझ्या मार्कांची टोटल केली तरी ती 92 भरत नाही….! 

(तुम्ही घरातले म्हणून सांगतोय, बाहेर कोणाला सांगू नका….अर्थात माझ्या पुस्तकात ते सर्व जाहीर झालंच आहे म्हणा….)

असो, मी जे माझ्या आयुष्यावर आणि आलेल्या अनुभवांवर पुस्तक लिहिलं आहे, त्याच्या विक्रीतून या सर्व मुलांचा शैक्षणिक खर्च भागवत आहे….! या सर्व मुलांच्या फीया जमेल तशा भरत आहोत.

आपण अनेक मंडळी भीक मागणाऱ्या मुलांना शैक्षणिक मदत व्हावी, या एकाच हेतूने, माझ्याकडून माझं पुस्तक विकत घेत आहेत; (आवडो न आवडो ) – मी आपल्यासमोर नतमस्तक आहे….! 

भीक मागणाऱ्या व्यक्तींना भीक द्यायची ? की मदत करायची ? भीक आणि मदत यात फरक काय ?  त्यांच्याशी कसं वागायचं ? बिस्किट, पाणी, अन्नदान द्यायचं का नाही ? ते खरंच गरजू आहेत की धंदा म्हणून भीक मागत आहेत… ?  गरजू आणि धंदेवाईक भीक मागणाऱ्या लोकांना आम्ही कसं ओळखायचं ? वगैरे   वगैरे याविषयी मी माझ्या पुस्तकात सविस्तर लिहिलं आहे…..

हा मेसेज सर्वदूर पोहोचावा यासाठी मी ग्रंथालयांना मोफत पुस्तक देत आहे….! 

आपल्या माहिती मधील ग्रंथालयांना जर पुस्तक हवी असतील तर मला कळवावे, मी ती मोफत स्वखर्चाने पाठवायला तयार आहे… ! 

अन्नपूर्णा

रस्त्यावर जगत असलेल्या आई बाबा, भाऊ बहिण यांना किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणाऱ्या किमान २०० गरजु गोरगरीबांना, दररोज जेवणाचे डबे हातात देत आहोत. (रस्त्यात दिसेल त्याला सरसकट डबे आम्ही वाटत नाही)

दिव्यांग कुटुंबाला आम्ही हे डबे तयार करण्याचे काम दिले आहे..It’s our win-win situationz

इकडे एका कुटुंबाला उत्पन्न मिळाले, जगण्यासाठी सहाय्य मिळाले आणि तिकडे भुकेने तडफडणाऱ्या लोकांना अन्न मिळाले.

मागच्या पंधरा दिवसांपूर्वी एक आजी भेटली….तिने हाताला धरून खाली बसवलं आणि म्हणाली माझ्याबरोबर जेव….छान चपाती होती, त्यावर हिरव्यागार मिरचीचा खर्डा आणि बाजूला लालेलाल लोणचं….सोबत थंडगार पाणी… !  जेवून तृप्त झालो….यानंतर तिने एका पूरचुंडीत बांधलेल्या….तिला कोणीतरी भिकेत दिलेल्या चकल्या मला खायला दिल्या….! 

प्रत्यक्ष अन्नपूर्णा भेटली… मी तिच्यासमोर नतमस्तक झालो… रोज अशा अन्नपूर्णा दरिद्री नारायणाच्या रूपात मला भेटतात… आणि रोज मी तृप्त होतो….

खराटा पलटण

खराटा पलटण म्हणजेच Community Cleanliness Team ! 

अंगात व्यवसाय किंवा नोकरीचे कोणतेही कौशल्य नसणाऱ्या प्रौढ / वृध्द महिलांची एक मोळी बांधून, त्यांच्याकडून पुण्यातील अस्वच्छ भाग स्वच्छ करून घेत आहोत, त्या बदल्यात त्यांना पगार किंवा किराणा माल देत आहोत.

या महिन्यातही खराटा पलटणाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी स्वच्छता केली आहे आणि त्या बदल्यात टीममधील प्रत्येकाला पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधा दिला आहे.

मनातलं काही – – 

  1. आजचं वर्तमानपत्र उद्या रद्दी असतं….तसंच उमेदीत असलेल्या आई-बापांना वापरून घेतलं, की त्यांची मुलंबाळ, नातवंडे, वृद्धापकाळात अशा लोकांना रद्दी समजतात आणि बाहेर फेकून देतात. माझे मित्र श्री केतन मराठे, यांच्या लहान मुलाने घरोघरी फिरून रद्दी गोळा केली आणि त्याचे 1400 रुपये आले, ते त्याने मला दिले.

… रद्दी झालेल्या लोकांसाठी, रद्दी विकून निधी गोळा करणे हा योगायोग म्हणू ?  की श्री मराठे यांनी त्यांच्या मुलावर केलेला संस्कार म्हणू ?? की इतका लहान मुलगा आता खूप मोठा झाला आहे असं म्हणू… ???

  1. कोणीही प्लास्टिक बॅग वापरू नये, त्याऐवजी कापडी पिशव्या वापराव्या, यासाठी मी आणि माझे भिक्षेकरी लोक आम्ही प्रयत्न करत आहोत.

यासाठी पुणेरी टोमण्यांचे बोर्ड तयार केले आहेत. आम्ही आमच्या भिक्षेकर्‍यांच्या गळ्यात ते अडकवणार आहोत….. प्लास्टिक पिशव्या वापरू नये, कपडे पिशव्या वापरा असा गमतीशीर, पुणेरी सल्ला माझे हे लोक समाजाला देतील.

याच सोबत ज्यांच्या अंगात शिवणकला आहे, अशा सर्व लोकांना नवीन शिलाई मशीन घेऊन दिली आहे. पूर्वी भीक मागणाऱ्या अशा लोकांकडून आपण पिशव्या शिवून घेणार आहोत. जे लोक कापडी पिशव्या शिवतील किंवा विकतील अशा सर्वांना आपण दिलेल्या निधीमधून आपण पगार देणार आहोत.

स्वार्थातून परमार्थ….!!! 

जे लोक पिशव्या शिवतील त्यांना त्या दिवसाचा पगार मिळेल, जे लोक पिशव्या विकतील त्यांनाही त्या दिवसाचा पगार मिळेल आणि त्याहून सर्वात महत्त्वाचं म्हणजे हळूहळू का होईना, परंतु प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी होईल आणि त्या जागी त्यांच्या हातात कापडी पिशव्या असतील…

तथाकथित भिक मागणारे लोक समाजाला प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नका म्हणतील….कापडी पिशव्यांचा प्रसार करतील….पुढील पिढी वाचवण्याचा प्रयत्न करतील जगातील आपला हा पहिला प्रकल्प असेल… ! 

पुणेरी टोमण्यांचे बोर्ड मी आपल्या माहितीसाठी मुद्दाम पाठवले आहेत.

  1. मागच्या आठवड्यात एक मुलगी भेटली, जवळ येऊन लाजत म्हणाली, सर माझं लग्न ठरलंय….पोरगा तुमच्या वळकीचाच हाय… इतकं म्हणूस्तोवर पोरगा पुढे आला… या दोघांनाही पूर्वी आपण व्यवसाय टाकून दिला होता.

..छुपे रुस्तम म्हणत मी दोघांच्याही गालावर चापटी मारली. तितक्यात मुलगी म्हणाली, ‘सर सोलापूरला आमच्या मूळ गावात लग्न ठीवलंय, इतक्या लांब तुमी येणार नाही माहित आहे, म्हणून आहेर घेऊन आलोय… !’ यानंतर अक्षरशः टॉवेल, टोपी आणि पॅन्ट पीस असा भररस्त्यात मला त्यांनी आहेर केला. अशा आहेराला “भर आहेर” का म्हणत असावेत हे आज मला कळलं.

मला खूप आनंद झाला….तरी मी रागावून त्यांना म्हटलं हा असला फालतू खर्च करायचा कशाला….? 

यावरती रडत पायाशी बिलगत ती म्हणाली, ‘सर तुमाला तर म्हाईत आहे, मला वडील नाहीत, वडिल म्हणून पयला आहेर तुमाला….! 

……यार, पोरी कधी मोठ्या होतात बापाला कळत नाही….कळतच नाही राव….! 

लेख खूपच लांबलाय….! मी तर काय करू ? सासरहून मुलगी जेव्हा माहेरी येते त्यावेळी, आई बापाला काय सांगू आणि काय नको ? असं होतं….आज माझं सुद्धा तसंच झालंय… ! 

तुम्हीच माझे आई आणि बाप आहात….आता तुमच्याजवळ मन नको मोकळं करू….तर आणखी कुणा जवळ करू….? 

प्रणाम  !!!

– समाप्त – 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य – एक नाटक ? .. की एक खेळ ? – भाग-१ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य – एक नाटक ? .. की एक खेळ ? – भाग-१ ☆ डॉ अभिजीत सोनवणे

कुणीतरी म्हटलंय, आयुष्य हे एक रंगमंचावरचं नाटक आहे… 

पण मला वाटतं, आयुष्य हा एक खेळ आहे. या खेळात हरणं – जिंकणं, आनंद – दुःख, आशा – निराशा, मोह – स्वार्थ – त्याग – तिरस्कार, जिद्द, उपेक्षा, तगमग, तळमळ… पुस्तकात लिहिलेल्या या सर्व भावना प्रत्येक खेळात प्रत्यक्ष अनुभवाला येतात. आयुष्य यापेक्षा काय वेगळं आहे ? 

खेळामध्ये मात्र एक नियम असतो, आपल्या टीम मधल्या / कुटुंबातल्या सदस्याला आपण त्रास द्यायचा नाही, हरवायचं नाही, हरू द्यायचं नाही… मग हा खेळ क्रिकेट असो की कबड्डी…!! 

दुर्दैवाने आयुष्याच्या खेळात मात्र हा नियम पाळला जात नाही…! 

अनेकदा आपलेच लोक, आपल्याच माणसांचे पाय ओढून, त्याला रिंगणा बाहेर फेकून देतात, कायमचं आऊट करतात… ! 

ज्या लोकांना असं रिंगणाबाहेर टाकलं जातं, त्या लोकांच्या काही चुका असतीलही, मान्य … पण ज्या पानावर चूक आहे, फक्त ते पान फाडायचं ?  की आख्ख पुस्तकच फाडायचं….??? 

चुका होणं हि प्रकृती…. चूक मान्य करणं हि संस्कृती…. आणि चुका सुधारणं हि प्रगती…! 

पण एखाद्या चुकीसाठी एखाद्याला कायमचं आउट करणं ही मात्र विकृती…!!! 

एकदा ही माणसं आयुष्यातून आउट झाली… बाद झाली की लवकर सावरत नाहीत….बरोबर आहे, पाडणारे आपलेच असतील, तर सावरायला वेळ लागतोच..!!!  असो…

उन्हाळा खूप वाढलाय असं सारखं कानावर येतं… 

घरात पंख्याखाली सुद्धा अंगाची लाही लाही होते…      मी तर उन्हात डांबरी रस्त्यावर एखाद्या गटार /उकिरड्याशेजारी किंवा इतर मिळेल त्या जागी बसलेलो असतो. (मला लोक त्यांच्या घरासमोर किंवा दुकानासमोर किंवा इतर चांगल्या जागी बसु देत नाहीत, त्यांच्या मते हे घाणेरडे लोक आमच्या नजरेसमोर नकोत)

तर…. रस्त्यावर बसल्यावर, खालून चटके आणि वरूनही चटके…!!! 

रस्त्यावर भर उन्हात दिवसभर शे दिडशे किलोच्या बॅगा सांभाळत असतानाही, उन्हाळ्याचा त्रास मला मात्र जाणवत नाही…. 

रणरणत्या उन्हात, मी बसलेलो असताना, दोन तीन भिक्षेकरी माझ्यामागे नुसतेच उभे असतात…. मागे उभे का रे ?  असे पुढे या… असं मी दटावलं तरी माझं ते ऐकत नाहीत…. दोन तासाने माझं काम संपतं …मी बॅग आवरायला घेतो आणि मग ते पुढे येतात… ते पुढे आल्या आल्या मला उन्हाची तीव्रता जाणवू लागते… मी पुन्हा दटावून विचारतो … असे वेड्यासारखे माझ्या मागे मागे काय घुटमळत होता रे ? त्यातला एक जण मग चाचरत म्हणतो, ‘डाक्टर तूमाला उन्हाचा लय चटका बसत हुता… आमी म्हागं हुबं राहून तुमच्यावर सावली धरली हुती ओ…!!! 

.. .. दोन तास स्वतः उन्हात उभे राहून यांनी माझ्यावर सावली धरली होती…. भर उन्हातही मग डोळ्यामधून पूर येतो..! 

स्वतः चटका सहन करून दुसऱ्यावर सावली धरणारा फक्त एक बापच असू शकतो… 

ही प्रेमळ माणसं, बाप होऊन, माझ्या वाटेवरची झाडं होतात… डोक्यावर सावली धरतात… मग माझ्यासारख्या वाटसरूला ऊन कसं लागेल ? 

मला उन्हाळा जाणवतच नाही…. कोण म्हणतं उन्हाळा वाढलाय म्हणून…? 

भर उन्हाळ्यात रस्त्यावर मी बसतो तेव्हा माझ्या आज्ज्या, आया, मावश्या माझ्या डोक्यावर पदर धरतात, कुणीतरी उकिरड्यातला एखादा पुठ्ठा घेऊन येतं आणि बाजूला बसून वारा घालतं… मध्येच कुणीतरी पदरानं घाम पुसतं…. तर मध्येच कोणीतरी थंडगार पाण्याची बाटली आणून देतं…. भिकेतून मिळालेल्या पैशातून कोणी ताक विकत आणतं….तर कुणी लस्सी…. तर कुणी उसाचा रस…. 

प्रेमाच्या आणि मायेच्या इतक्या शितल वातावरणात मी बसलेला असतो, की मला उन्हाळा जाणवतच नाही….. उन्हाची प्रत्येक लाट, माझ्यासाठी थंडगार वाऱ्याची झुळूक बनून येते… मला मग उन्हाळा जाणवतच नाही…. कोण म्हणतं उन्हाळा वाढलाय म्हणून…? 

मी आहे साधा भीक मागणाऱ्या लोकांचा डॉक्टर, पण त्यांच्यात गेलो की ते मला एखाद्या देशाचा राजा असल्याचा फील देतात…

काही तासातच ते मला जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती बनवतात… रोज – रोज आणि रोजच…!

दुसऱ्याला श्रीमंत बनवणाऱ्या, आयुष्याच्या खेळात कायमस्वरूपी आऊट झालेल्या आणि रिंगणाबाहेर बसलेल्या या व्यक्तींच्या जखमांवर तुम्हा सर्वांच्याच सहकार्याने फुंकर घालत आहे आणि म्हणून या महिन्याचा लेखाजोखा आपणास सविनय सादर ! 

*(आमच्या कामाचा मूळ गाभा फक्त वैद्यकीय सेवा देणे नसून, वैद्यकीय सेवा देता देता, त्यांचा विश्वास संपादन करणे, त्यांच्याशी चांगले नाते निर्माण करणे, भिक मागण्याची कारणे शोधणे, त्यांच्यामधील गुणदोष शोधून त्यांना व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणे आणि त्यांना झेपेल तो व्यवसाय टाकून देणे…. जेणेकरून ते भिक्षेकरी म्हणून नाही, तर कष्ट करायला लागून, गावकरी होऊन ते सन्मानाने जगतील… कुणीही कुणापुढे हात पसरून लाचार होऊ नये, जगात कोणीही भिकारी असू नये, हा आमच्या कामाचा मूळ गाभा आहे, वैद्यकीय सेवा देणे हा त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही फक्त मार्ग म्हणून निवडला आहे)*

भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी

दारुड्या नवरा – मतिमंद मूल आणि अपंग आई… कंटाळून तीने शेवटी घर सोडलं; म्हणण्यापेक्षा नवऱ्यानेच तीला घराबाहेर हाकलून दिलं…!

पुण्यात आली… या तीनही पिढ्या, सातारा रोड येथील एका मंदिराबाहेर भिक मागू लागल्या… 

ताई खमकी आहे पण त्यापेक्षा सुद्धा जास्त संवेदनशील…

मला भेटली आणि आपोआप भाऊ बहिणीचं नातं प्रस्थापित झालं…

तिला यानंतर नात्याचा उपयोग करून काही बाही विकण्याचा व्यवसाय रस्त्यावर टाकून दिला…. ती तो प्रामाणिकपणे करत होती… ! 

 

तिची आई पूर्णतः बहिरी आहे… ताईचा बारा वर्षांचा मुलगा मतिमंद…. दरवेळी मी मुलाला चॉकलेट घेऊन जातो… तिच्या आईला म्हणजेच आजीला मी खूप चिडवतो…. “ए बहीरे म्हातारे” म्हटल्यावर तिला खूप राग येतो (बरोबर हे तीला कसं ऐकू जातं हे मला अजून कळलं नाही)

.. ही आजी मला दाद्या म्हणते…  तीच्या मुलीचा ती मला मोठा भाऊ समजत असावी कदाचित… ! बऱ्याच वेळा हक्कानं शिव्याही देते…

 

तर, हीच बहिरी आजी तासनतास माझ्या डोक्यावर छत्री घेऊन उभी असते…. मी तीला प्रेमाने म्हणतो, ‘म्हातारे बस की आता थकली असशील…’ 

तिला मात्र, ‘ बहिरे, मर की आता थकली असशील…’  का कोण जाणे पण, असं ऐकू येतं… मी का मरू ?  असं म्हणत, यानंतर ती छत्री घेऊन मला मारण्यासाठी माझ्या पाठी लागते… !

 

अशा सगळ्या गंमती जमती…  जे ऐकायला यायला हवं तेच ऐकायला येत नाही….

तर ही ताई आता याच मोठ्या मंदिराच्या बाहेर सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला लागली आहे. 

अत्यंत ओंगळवाण्या, दीनवाण्या अवतारात हिला पाहिली होती… आता जेव्हा हिला रुबाबदार युनिफॉर्म मध्ये पाहतो, तेव्हा मला काय वाटतं… ? मी शब्दात सांगू शकत नाही…! 

 

एके दिवशी म्हातारी आली आणि माझ्या कानात ओरडून म्हणाली, ‘दाद्या आता मी मरायला मोकळी झाले…’ 

मी पण तेवढ्याच प्रेमानं तीला कानात ओरडून सांगितलं, ‘म्हातारे मरू नको इतक्या लवकर…’ 

बहुतेक तीला “म्हातारे मला मारू नको” असं ऐकू आलं असावं…. ती माझ्या गालाचे, हाताचे मुके घेत म्हणाली, ‘भयनीचं इतकं करतुस दाद्या, आता मी तुला न्हायी मारणार… न्हायी मारणार…! 

.. .. असं म्हणत ती माऊली अश्रूंचा अभिषेक माझ्या हातावर करते… मी तीला कानात ओरडून म्हणतो, ‘ म्हातारे, काळजी करू नकोस,  तीला मी बहीण म्हणून स्वीकारलं आहे…. तीचा हात मी कधीच नाही सोडणार.. तुज्या शप्पत…’

– ही संपूर्ण वाक्ये मात्र जशीच्या तशी बहिऱ्या म्हातारीला ऐकू जातात… शेवटी आईच ती….! 

‘ न्हायी सोडणार ना भयनीचा हात….? न्हायी सोडणार ना भयनीचा हात….?? ‘ माझ्या पाठीवरून खरबरीत हात फिरवत ती दहा वेळा माझ्याकडून वदवून घेते… मला तिच्या चेहऱ्यावर माय दिसते…. डोळ्यात गाय दिसते….! 

– क्रमशः भाग पहिला  

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆– ‘स्क्रेपरबोर्ड’ चित्रकार —श्री. शंकरराव फेणाणी – ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ – ‘स्क्रेपरबोर्ड’ चित्रकार —श्री. शंकरराव फेणाणी – ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

30 एप्रिल 2024….. भारतातील ‘स्क्रेपरबोर्ड चित्रकला’ या अत्यंत कठीण विषयातील अग्रगण्य मानले जाणारे चित्रकार – श्री. शंकरराव फेणाणी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कार्याचा रंजक माहितीपट अवश्य पहावा असाच आहे. 

जवळपास ५५ वर्षांपूर्वी वृत्तपत्रांमधील फोटो व जाहिराती उत्तमरित्या छापून येण्यासाठी फोटोग्राफीचे तंत्रज्ञान फारसे विकसित न झाल्याने, ‘स्क्रेपर बोर्ड’ ही अत्यंत कठीण, ब्रिटिश शैलीची चित्रकला वापरली जाऊ लागली. 

एका पुठ्ठ्यावर प्लास्टर ऑफ पॅरिसचा जाड लेप देऊन, त्यावर काळी पेलिकन शाई ओतून ती वाळल्यावर, एका अत्यंत सूक्ष्म टोकाच्या ‘निब’ने, उभ्या – आडव्या रेषा कमीजास्त वजनाने कोरून, त्या तयार झालेल्या टिंबांच्या सहाय्याने चित्र निर्माण करत असत . शिल्प तयार करताना जसा दगडातील नको तो भाग काढून टाकतात त्याप्रमाणे अत्यंत ‘सूक्ष्मतम’ असे हे काम असे. एखादे टिंब जरी चुकले, तरी संपूर्ण चित्र वाया जाण्याची शक्यता असल्याने, लक्ष पूर्णपणे केंद्रित करून, काटेकोरपणे, अचूक चित्र त्यातून निर्माण करावे लागे. छापताना हे चित्र उलटे छापले जाणार, हे लक्षात ठेवून, बारकाईने लक्ष ठेवून हे अत्यंत कठीण काम तासन् तास म्हणजे सलग जवळपास 18…20 तास करावे लागे. यात माझे बाबा शंकरराव फेणाणी यांचा हातखंडा होता. त्यांचे नेमके काम पहायचे असेल तर … प्रत्येक फोटो मोठा करून पाहिल्यास प्रत्येक बिंदूची कल्पना येईल. आणि ही चित्रे काढणे हे किती अवघड, किचकट आणि वेळखाऊ काम आहे याचीही जराशी कल्पना येईल.

भारतातील अगदी तुरळक आणि उत्तम ‘ स्क्रेपरबोर्ड आर्टिस्ट’ पैकी ते अग्रगण्य मानले जात. 

माझे वडील म्हणून तर मला ते सदैव वंदनीय आहेतच. आज एक उत्तम आणि दुर्मिळ कलाकार म्हणूनही त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त माझे त्यांना शतश:प्रणाम. 

©  सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ खजिना… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ खजिना… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

मी स्वतःला नेहमीच भाग्यवान समजते. त्याला तशी अनेक कारणे आहेत पण त्यातलं मुख्य कारण म्हणजे मला खूप मित्र आणि मैत्रिणी आजही आहेत.  मी जिथे जाते तिथे माझी कोणाशी ना कोणाशी मैत्री होतेच आणि ती सहजपणे घट्ट होत जाते.

आयुष्याच्या टप्प्याटप्प्यावर माणसं भेटतात.  काही कालपरत्वे  स्मृतीआड होतात तर काही मात्र आपल्याबरोबर आयुष्यभर सोबत राहतात.  घट्ट मैत्रीच्या रूपात. अगदी जीवाला जीव देणारे वाटावेत  इतके जवळचे असतात ते!

मैत्रीचा पहिला टप्पा असतो तो बालपणीचा, शालेय जीवनातला.

अशी एक सर्वसाधारण भावना,समजूत आहे की बालपणी जी मैत्री होते तशी आयुष्याच्या पुढील जाणत्या टप्प्यात ती कुणाशीही  होऊ शकत नाही. खोटं नसेल, खरंही असेल पण माझा मात्र अनुभव असा नाही.  सत्तरीनंतर माझी अनेक  परिवाराशी अॉनलाईन मैत्री झाली आणि काय सांगू? किती नावं घेऊ? प्रत्येक जण माझ्यासाठी जिवलग आहे. माझ्या हाकेला ‘ओ’ देणारी अनमोल रत्ना सारखी  माणसं मला इथे भेटली आणि याची जाणीवच मला खूप सुखद वाटते.

पण तरीही भूतकाळात रमताना अनेक चेहरे माझ्यावर आजही माया पाखडताना मला जाणवतात.  पुरुषांच्या बाबतीत ‘लंगोटीयार’ असा घट्ट मैत्रीच्या बाबतीत वापरला जाणारा शब्द आहे.  स्त्रियांच्या बाबतीत मी मैत्रीविषयी माझा स्वतःचाच  शब्द योजिते. ‘चिंचाबोरांची मैत्री.’ या रिंगणातल्या माझ्या सख्यांनी तर माझा बालपणीचा काळ अधिक रम्य केला आहे.

कुठलीही  समस्या त्यावेळी गंभीरच असते ना? त्यावेळी गृहपाठ केला नाही म्हणून बाई रागावल्या, शाळेच्या पटांगणात खेळताना दाणकन्  पडून जखमी झाले,  कधी कुठल्यातरी कार्यक्रमातून डावललं  गेलं, एखादं खूप कठीण गणित सुटलं नाही, परीक्षेच्या वेळी आजारी पडले, शालेय सहलीला जाण्यासाठी घरून परवानगी मिळाली नाही, स्पर्धेत नंबर आला नाही अशा आणि अशा तऱ्हेच्या अनेक भावनिक प्रसंगी माझ्या जिवलग सख्या माझ्यासोबत सदैव राहिल्या आहेत.  खरं म्हणजे आता भेटीगाठी होत नाहीत. आयुष्याच्या वाटेवर मैत्रिणींची खूप पांगापांग  झाली पण मनात जपून ठेवलेली मैत्री मात्र तशीच उरली.  आता या वयात कधीतरी कुणाकडून तरी,

“ती गेली” अशा बातम्या कानावर  येतात पुन्हा ती चिंचाबोरं,  त्या लंगड्या,  फुगड्या, कट्टी—बट्टी आठवते. आयुष्यात सगळं काही धरून ठेवता का येत नाही याची खंत वाटते.

त्यादिवशी वेस्टएन्ड मॉलमध्ये मी फिरत होते आणि दुरून एक हाक आली. “बिंबाsss”

या नावाने इथे मला हाक मारणारं  कोण असेल? मी मागे वळून पाहिले आणि मीही तितक्याच आनंदाने चक्क आरोळी ठोकली.

“भारतीsss”

दुसऱ्या क्षणाला आम्ही एकमेकींच्या गळ्यात. हातातल्या पिशव्या, भोवतालची माणसं, आवाज, गोंगट कशाचेही  भान आम्हाला राहिले नाही.  वयाचेही नाही.

“किती वर्षांनी भेटतोय गं आपण आणि तुझ्यात काहीही बदल नाही..!”

यालाच म्हणतात का जीवाभावाची मैत्री? मग पुढचे काही तास त्या रम्य भूतकाळात विहरत राहिले.

मी बँकेत नोकरी करत असताना माझा एक दोस्त होता. त्याला मी ‘मिस्टर दोस्त’ म्हणत असे. संसार सांभाळून नोकरी करणं हे कधीच सोप्पं नव्हतं. कालही नव्हतं  आणि आजही नाही पण या माझ्या दोस्ताने मला त्या काळात,  प्रत्येक आघाडीवर जी मदत केली ती मी कधीही विसरू शकणार नाही.  एकदा तर मी कंटाळून माझा राजीनामाही तयार केला होता.  त्या दिवशी याच माझ्या दोस्ताने मला जो मानसिक आधार दिला त्यामुळेच माझी नोकरी टिकून राहिली असे मी नक्कीच म्हणेन. कुठल्याही समस्येच्या वेळी त्याच्या नजरेत हेच निर्मळ भाव असायचे,

“मै हूँ ना!”

माझ्या या मित्र परिवाराच्या यादीत डॉक्टर सतीशचे नाव खूप ठळक आहे. दैनंदिन जीवनात येणाऱ्या अनेक मानसिक, शारीरिक, आर्थिक, कौटुंबिक समस्येत तो माझ्याबरोबर असायचाच पण एका प्रसंगामुळे  ‘मला सतीश सारखा मित्र मिळाला’ याचे खूप समाधान वाटले होते.

कठीण समय येता कोण कामास येतो? अथवा फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इंडीड किंवा अमित्रस्य कुत: सुखम्  यासारख्या उक्त्या आपण वाचतच असतो पण प्रत्यक्षात जेव्हा जीवनात त्याचा अनुभव येतो,  तो क्षण असतो खरा भाग्याचा! अमेरिकेहून भारतात परत येण्याच्या काही दिवस अगोदरच मला किडनी स्टोनचा भयंकर मोठा अॅटॅक आला होता. सतीशला,  माझ्या मिस्टरांनी कळवले. ते कळताक्षणी त्याने सांगितले, “तुम्ही ताबडतोब भारतात या. आपण इथेच ट्रीटमेंट घेऊ, सर्जरी करू. मी सगळी व्यवस्था करतो. काही काळजी करू नकोस.”

जळगाव स्टेशनवर पहाटे तीन वाजता माझा मित्र आम्हाला घ्यायला आला होता. वास्तविक तो गाडी आणि ड्रायव्हर पाठवू शकत होता पण तो स्वतः आला. जळगाव शहरातला अत्यंत व्यस्त आणि नामांकित सर्जन अशी ख्याती असलेला हा माझा मित्र स्वतःच्या प्रतिमेचा विचार न करता केवळ मनातल्या तळमळीने,काळजीने,  मैत्रीसाठी आम्हाला स्टेशनवर घ्यायला आला होता. तेही अशा अडनेड्या वेळी. गाडीतून उतरताच त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि त्या प्रेमळ स्पर्शाने माझा आजारी चेहरा क्षणात खुलला.”आता मी बरी होईन” असा दिलासा मला मिळाला.

जीवाभावाचे मित्र मैत्रिणी यांचा विचार जेव्हा माझ्या मनात येतो तेव्हा आणि माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा डोकावून बघताना जाणवते की बाल्याचा उंबरठा ओलांडतानाच आई ही कधी मैत्रीण झाली ते कळलंच नाही आणि वडील तर फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड  होतेच. हे सारे संस्कार मित्र!  यांचे आयुष्यातले स्थान ते नसतानाही आबाधित आहे आणि खरं सांगू का? बाहेरच्या जगात तर खूप मोठा मित्रपरिवार होताच पण घरात आमचा पाच बहिणींचा समूह होता. आजही आम्ही तितक्याच घट्ट मैत्रिणी आहोत. बहिणींपेक्षा जास्त मैत्रिणी. जीवाला जीव देणाऱ्या.  कुणाच्या आयुष्यात थोडं जरी खुट्टं  झालं की आमचा मजबूत वेढा असतो एकमेकींसाठी.

माझ्या घरात बारा वर्षे काम करणारी माझी बाई माझ्यासाठी कधी मैत्रीण झाली ते कळलंच नाही. तिला मी मैत्रीण का म्हणू नये? कामाव्यतिरिक्त आम्ही दोघी एकमेकींच्या जीवन कहाण्या एकमेकींना कित्येकदा सांगत असू. आमच्यामध्ये एक निराळाच बंध विणला गेला होता. तो स्त्रीत्वाचा होता. मी तर तिला माझी कामवाली म्हणण्यापेक्षा मैत्रीणच म्हणेन.

तशी तोंडावर गोड बोलणारी,’ओठात एक पोटात एक’ असणारी अनेक माणसं भेटली. ज्यांच्याशी मैत्री होऊ शकली नाही त्यांना मित्र/मैत्रीण तरी का म्हणायचे? ते मात्र फक्त संबधित होते.

माझ्यासाठी जीवाभावाच्या मैत्रीची आणखी एक व्याख्या आहे, नेहमीच काही संकटात मैत्रीची परीक्षा होत नाही. खरी मैत्री जी असते, ज्या व्यक्तीबरोबर आपण कम्फर्टेबल असतो, ज्या व्यक्तीबरोबर आपल्याला न्यूनगंड जाणवत नाही, सगळी बाह्य, ऐहिक  अंतरे सहज पार होतात, जिला आपण अगदी मनाच्या तळातलं विश्वासाने सांगू शकतो आणि जिला आपलं ऐकून घ्यायचं असतं.  भले तिच्याकडे आपल्या प्रश्नांची उत्तरे नसतील पण तिच्या खांद्यावर आपण डोकं टेकवू शकतो.

मी भाग्यवान आहे. मला असे मित्र-मैत्रिणी आजही आहेत आणि तोच माझा खजिना आहे, आनंदाचा ठेवा आहे.

हा विषय इतका व्यापक आहे की माझाच कागद अपुरा आहे.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares