मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संक्रांत असते कुणावर?… लेखक : श्री आनंद देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

??

संक्रांत असते कुणावर?… लेखक : श्री आनंद देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

संक्रांत ते रथसप्तमी हा कालावधी आमच्या नागरी भागात “ महिला चैतन्य पंधरवडा ” असतो. महानगरातील लोकांच्या नशिबी हे सुख (?) नाही. गावभर साड्यांचे चालते बोलते प्रदर्शन असते. आमची माता भगिनी भर दुपारी अंदाजे अडीच तीन वाजता कामाला लागते. अत्यंत उत्साहात भगिनीवर्गाच्या झुंडीच्या झुंडी दुपारी तीन वाजल्यापासून  भन भन,भन भन गावभर फिरत असतात. दररोज नवी साडी, हातात पर्स आणि पायात चपला घातल्या की माउली जे निघते ते पार रात्री आठ वाजता खिचडी टाकायलाच घरी पोहोचते. बरे दुपारी निघतानाचा आविर्भाव ramp (म्हणजे तो नाही का फ्याशन शो मध्ये असतो) वर चालण्याचा असतो. संध्याकाळी घरी परतेपर्यंत कपाळ जगदंबेसारखे कुंकवाने  माखलेले असते. साडी जमिनीला टेकून खराब होवू नये म्हणून उचलून धरताना हात दुखतात तिचे पण वेदना जाणवत नाहीत घरी पोहोंचेपर्यंत. हे साड्या तयार करणारे लोक उंचीप्रमाणे साड्या का तयार करीत नाहीत हे एक आम्हाला पडलेले जुनेच कोडे आहे. साड्यांची जाहिरात करणाऱ्या बहुत्येक सर्व मॉडेल उंचच्या उंच आणि चवळीच्या शेंगेसारख्या आकाराच्या असतात.(लिखाणाला दर्जा प्राप्त होण्यासाठी लेखकाला किती सूक्ष्म निरीक्षण ठेवावे लागते याची नोंद घ्या). तर मग प्रश्न असा उभा राहतो की चवळीला आणि बरणीला एकच वस्त्र कसे चालेल ? असो. तर दरम्यानच्या काळात कुंकवाचा धनी आणि लेकरेबाळे हवालदिल झालेली असतात. ते बिचारे काल परवाच्या आईच्या वाणात काही खायचे आले आहे का याचा निष्फळ शोध घेतात. त्या दिवशीचे हळदी-कुंकू संपवून घरी परत आल्यानंतर बोलून बोलून, बोलून बोलून तिच्या घशाला कोरड पडलेली असते. आपण शांतपणे पिण्यासाठी पाणी आणून द्यावे. हाश-हुश्य झाले की संपूर्ण वृत्तांत ऐकून घ्यावा लागतो. म्हणजे “अमुक एक बाई, किती श्रीमंत पण वाणात लुटले (वाटले) काय तर रुपड्याच्या शाम्पूच्या पुड्या….” किंवा ,”तमुक बाईकडे दिलेले दुध इतके पांचट होते की मला तर  तिथेच कसेतरी होवू लागले…..संपूर्ण पिवूच शकले नाही मी…”  पुढचा डायलॉग संपूर्ण कुटुंबाला सुखावणारा असतो, “कधी एकदा रथसप्तमी येते असे झाले आहे.” त्यामुळे कधी एकदाची रथ-सप्तमी येते असे घरातील मुलांना आणि पुरुषवर्गालापण  झालेले  असते. हे थकव्याचे वैराग्य जेमतेम बारा तास टिकते. नवा दिवस, नवी साडी आणि तोच उत्साह दुसऱ्या दिवशी  असतोच असतो.

त्यात पुन्हा दूर अंतरावरील प्रतिष्ठित घरी हळदी कुंकू असेल तर होयबाला……माफ करा,,,,, नवरोबाला तिला गाडीवर बसवून न्यावे लागते. “तू पटकन हळदी-कुंकू घेवून ये तोवर मी इथे कोपर्यावर उभा राहतो”….यावर “आलेच पाच मिनटात” असे म्हणून ती अदृश्य होते. दहा, पंधरा, वीस मिनिटे होतात. याचे बिचार्याचे व्हाटसअप, फेसबुक पाहून होते तरी हिचा पत्ता नाही.  ‘त्या’ घरात गेलेली आपली माउली कधी बाहेर येते याची वाट पहात तो निरागस जीव  इतका कंटाळतो की इतक्या प्रतीक्षेने तर  विठूमाउलीचे दर्शन सुद्धा झाले असते असे त्याला वाटायला लागते. बरे कोपर्यावर असे आगंतुक उभे राहणाऱ्या पुरुषाला जाणाऱ्या येणाऱ्या महिला विचित्र नजरेने पाहतात त्यामुळे त्याला मेल्याहून मेल्यासारखे होते. आम्हाला साहित्यिक म्हणून ओळखणाऱ्या तर एकमेकीना,”बघ तेच ते…..कसे बेशरम सारखे उभे आहेत, बायका पहात “ असे म्हणत असाव्यात असा आम्हालाच संशय आहे. मग तब्बल चाळीस पंचेचाळीस मिनिटे झाल्यावर आपले ‘मॉडेल’ येतांना दिसते. बायकोच्या भन भन,भन भन फिरण्याला कंटाळलेला पती मग फन फन,फन फन करतो. (किती लयबद्ध वाक्यरचना आहे नाही? यातील संगीत कळण्यासाठी मराठवाड्यातच  जन्म घ्यावा लागतो महाराजा..). “उद्यापासून तुला वाटले तर तू जा , मी अज्जिबात येणार नाही”, अशी युती तोड्ल्यासारखी गर्जना तो करतो यावर ती गालातल्या गालात हसते, कारण तिला माहित असते की आज नाहीतर उद्या पुन्हा युती होणारच आहे.

या दिवसात एखादा मध्यमवयीन (म्हणजे हिंदीमध्ये याला अधेड उम्रका असे म्हणातात, म्हणजे ‘कुणी बाळा म्हणले तरी याला राग येतो आणि कुणी काका’ म्हणले तरी राग येतो.) पुरुष सायंकाळच्या वेळी विमनस्कपणे रस्त्यावर फिरताना दिसला तर हमखास समजावे की,”आज याच्या घरी हळदी-कुंकू आहे” म्हणून. म्हणजे ज्याच्या नावाने कुंकू लावले जाते त्यालाच घराबाहेर काढणारा सण म्हणजे संक्रांत होय. आता कळाले का आपली संस्कृती महान का आहे ते ? आपल्याच घरी जाण्याची सोय नसलेला हा कुटुंब-प्रमुख (?) मग  नियंत्रण सुटलेल्या उपग्रहासारखा भरकटत राहतो. या दिवसात थेटरात संध्याकाळी सहाच्या शो ला आलेले एकटे पुरुष हे असेच “हळदी-कुंकू के मारे” असतात.

अर्थात सगळेच विवाहित पुरुष काही इतके पापभिरू नसतात. चाणाक्ष मंडळी आपल्या घरी हळदी-कुंकू कधी आहे याची अधाश्यासारखी वाट पहात असतात.दिवसभर घरी सहकार्य करणारी  अशी मंडळी  साधारण चार-साडेचार च्या सुमारास जे फरार होतात ते थेट रात्री बारा वाजता, “उगवला चंद्र पुनवेचा”अशा परिपूर्ण अवतारात घरी अवतीर्ण होतात. आपण इकडे हळदी-कुंकू साजरे करीत होतो तेंव्हा आपल्या भाळावरील कुंकवाच्या धन्याने काय रंग उधळले असतील याची माउलीला लगेच कल्पना येते.   पण ती आज नेहमीप्रमाणे सौदामिनीचा अवतार धारण न करता ‘अलका कुबल’ होण्यात धन्यता मानते कारण आज ती तृप्त असते. आज तिच्या नव्या साडीचे, म्याचींग ब्लाउजचे. टिकलीचे, अंगावरील दागीन्यांचे, बैठीकीतील नव्या गालिच्याचे,  फ्लॉवरपॉटमधील फुलांचे, गजर्यातील वेणीचे, केलेल्या पदार्थांचे, लग्न होवून पुण्यात आयटी मधील नोकरी सांभाळून संसार करणाऱ्या आणि  आज संक्रांतीसाठी आलेल्या तिच्या लाडक्या लेकीचे  आणि तिचा जीव की प्राण असणाऱ्या तिच्या घराचे कौतुक झालेले असते. या सगळ्या कौतुकाचा एक ‘ग्लो’ तिच्या चेहऱ्यावर झळकत असतो. एकदाची रथसप्तमी होते आणि ती नव्या उमेदीने पुढच्या संक्रांतीची वाट पहाटते. असो. महानगरातील लोकांच्या नशिबी हे सुख (?) नाही.सुखाचा शोध लागलाच तर इकडेच कुठे तरी लागेल, ग्रामीण नागरी भागात.

लेखक : श्री आनंद देशपांडे, परभणी

संग्राहक : श्री श्यामसुंदर धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ….आणि  फूल  कोमेजून गळले… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ ….आणि  फूल  कोमेजून गळले… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

गेले वर्षभर कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला तोंड देणारी आमची प्राजक्ता गेली…हे जरी कधी तरी घडणार हे अटळ होते, तरी प्रत्यक्षात ती जाणे ही गोष्ट पचवणे खूपच अवघड जात आहे..

प्रकाशभावजी आणि दिप्ती यांच्या संसारात प्राजक्ता म्हणजे तसं उशिरानेच उमललेले हे सुकुमार फूल! सांगलीला आम्ही एकाच ठिकाणी राहत असल्याने ती जन्मल्यापासूनच मी तिला पाहत होते. तिच्याविषयी काय बोलावे? खरोखरच गुणी मुलगी होती ती! लहान होती तेव्हा इतके शांत होती की घरात लहान मुल आहे हे सुद्धा कळू नये! लहानपणापासून अभ्यासात हुशार,देखणी, सर्वांशी मिळून मिसळून वागणारी, भरपूर मित्र-मैत्रिणी असणारी, स्वभावाने शांत पण तरी तितकीच स्वतःची मते ठामपणे मांडणारी अशी प्राजक्ता इंजिनियर झाली! अशी ही सुंदर गुणी मुलगी.

ओंकार आणि तिचा प्रेम विवाह झाला. लग्नानंतर दोघेही जर्मनीला गेले. तिच्या आयुष्यातील परमोच्च सुखाचा काळ असेल तो! दोघेही समरसून उपभोगत होते, पाच सहा वर्षाच्या नोकरीनंतर दोघांनीही भारतात परत येण्याचा निर्णय घेतला आणि इथे आल्यावर दोघांचेही जॉब चालू झाले..

सर्व काही चांगले चालू असताना अकस्मात तिच्या बाबांना हार्ट अटॅक आला, हार्टचे आॅपरेशन झाले आणि त्यांचे महिनाभराचे आजारपण चालू असतानाच प्राजक्ताच्या कॅन्सरचे निदान झाले. बाबांना हे कळू नये म्हणून तिने आटोकाट प्रयत्न केले. शेवटी बाबा गेल्यावरच तिचे खरे आजारपण सुरू झाले…

ओंकार आणि प्राजक्ताने  प्राजक्ताचे कॅन्सरचे निदान झाल्यापासून शर्थीचे प्रयत्न केले. सर्व प्रकारच्या उपचारांना तिने धैर्याने तोंड दिले. ओंकारची साथ ही खरोखरच प्रचंड होती. त्याच्या आधारावरच तिचे आयुष्य चालू होते.. एलोपथी, होमिओपॅथी, टार्गेट थेरपी ट्रीटमेंट, आयुर्वेदिक सर्व प्रकारचे उपचार तिने

केले. गेले वर्ष  या सर्वांमध्ये तिची आई, बहीण, मेव्हणे सर्व साथ देत होते…. पण कॅन्सर हा असा काही रोग आहे की,  त्याचा शेवट मृत्यूकडेच जातो..काही सुदैवी उपचारानंतर त्यातून बरेही होतात .. किंवा काही काळापुरते आयुष्य ही वाढते. ….

भारतात आल्यावर वाकड येथे त्यांनी मोठा फ्लॅट घेतला होता. हौसेने घराची सजावट केली होती. उमेदीचे वय होते.. पण नशिबात वेगळेच वाढून ठेवले होते. कसेबसे पाच सहा महिने त्या फ्लॅटवर ते राहिले असतील आणि तिचे दुखणे वाढले. 20 नोव्हेंबरला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. अक्षरशः रोगाशी झगडणे चालले होते. शेवटी सात जानेवारीला तिला घरी आणले. स्वतः प्राजक्ताही आपल्या दुखण्याबरोबर खंबीरपणे लढत होती, पण प्रयत्न करणे आपल्या हाती, यश अपयश सगळं परमेश्वराकडे..

हॉस्पिटल मधून घरी आणल्यावरही प्रत्येक श्वासासाठी तिला झगडावे लागत होते. ऑक्सिजन सिलेंडर बिचारा आपले काम करत होता, पण तिचे शरीर साथ देत नव्हते. जगण्याची मनापासून जिद्द होती, उमेद होती, मेंदू कार्यरत होता.. स्वतः आपल्या औषध पाण्याविषयी शेवटपर्यंत जागरूक होती. मृत्यूला चुकवायची निकराची लढाई चालू होती. वय किती तर अवघे पस्तीस पूर्ण! ही काय जायची वेळ होती का? जगेन मी, जगेन मी असा एक एक दिवस जात होता… पण शेवट त्याच्या हातात..

मकर संक्रांतीचा दिवस उजाडला. वाटत होतं, आजचा दिवस तरी जाऊ दे ,अलीकडे तिला बोलता येत नव्हते, पण खुणेने किंवा लिहून सांगू शकत होती, पण आज मात्र सकाळपासून सगळं हळूहळू शांत होत चाललं होतं..  हे आमचं प्राजक्ताचं फुल आता कोमेजायला लागले होते…,.. स्वर्गातून पृथ्वीवर आलेला प्राजक्त हळूहळू पुन्हा स्वर्गाच्या दिशेने वाटचाल करत होता! आपल्या छोट्याशा आयुष्यात मिळेल तेवढे सुख तिने घेतले आणि इतरांनाही आनंद दिला. जसं प्राजक्ताचे फुल जास्त काळ टिकत नाही, एकदा का झाडावरून खाली जमिनीवर पडले की फार कमी काळ राहते. लवकरच सुकते. त्याचे आयुष्यच तेवढे! ‘प्राजक्त’फुलाचा रंग, गंध हे सगळे अल्पकाळ असते. तशीच ही आमची प्राजक्ता! सुंदर, गुणी मुलगी अकाली गेली.. स्वर्गातील आपल्या स्थानी! ते प्राजक्ताचे फुल गळून पडले कायमचे! आम्हाला सुगंध देत राहील! प्राजक्त फुलासारखं नाजूक, निर्मळ, छोटसं आयुष्य संपलं तिचं!ती गेली, पण कायमच हा प्राजक्त आमच्या मनात राहील!

भावपूर्ण श्रद्धांजली !

  उज्वला काकू..

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठवांच्या हिंदोळ्यातून… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

? मनमंजुषेतून ?

☆ आठवांच्या हिंदोळ्यातून… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

आमची आत्या जाऊन पंधरा दिवस होऊन गेले.  आत्या ही फक्त नावापुरतीच आत्या होती , ती आम्हा भावंडांसाठी माहेरात असणारी जणू दुसरी आईच. तिच्या लग्नानंतर एका वर्षातच नवर्‍याने मांडलेल्या छळामुळे आमचे चुलते (आबा )यांनी तिला परत आमच्या घरी आणले. पुन्हा तिला परत सासरी नांदायला पाठविलेच नाही. आणि आत्याने पण कधी नांदयला जायची इच्छा व्यक्त केली नाही. तेंव्हा पासून ती माहेरात राहिली.  आपल्या तीन भावांचे संसार आणि त्यांची मुले संभाळण्यात ती रमली. तिने पंचवीस माणसांचे कुटुंब घट्ट मायेच्या मिठीत बांधून ठेवले. नात्यांचे सर्व मोती प्रेमाने एकाच मजबूत धाग्यात गुंफून, त्याची गाठही तितक्याच ओढीने घट्ट आवळली. आज आम्हा भावंडांमध्ये  एकमेकांबद्दल  जिव्हाळा , प्रेम, आपुलकी आहे  ती सर्व माझ्या आत्यानी केलेल्या  संस्कारांमुळे आहेत. आत्या जितकी प्रेमळ होती तितकीच रागीट सुध्दा होती. शाळेत गणिताचे गुरूजी आणि घरात आत्या यांचा मार खाऊनच आम्ही घडलो. 

आत्याला तिच्या स्वतःच्या संसाराचा अनुभव नव्हता. तरीही तिने अनेकांचे संसार उभे केले  आणि चांगल्या रितीने संसार कसा करायचा याची  शिकवणसुध्दा दिली. आत्या जणू अनुभवांचे एक पुस्तक होती. चाली-रीती, संस्कार यांची ती वारसदार होती. ती अशिक्षित होती. संस्कृतीची जपणूक उत्तम करत होती. आमच्या कुटुंबातच नव्हे तर गावात तसेच पै-पाहुण्यांच्यात  कोणतेही मंगलकार्य असले की आत्या तिथे हजर. तिच्या हातूनच सर्व कार्यक्रम पार पडायचे. तिला स्वतःला सुध्दा अशा दगदगीत वाहून द्यायला आवडायचे. 

आत्याच्या स्वतःच्या संसाराची वाताहात झाली पण भावांच्या संसारात येणारे चढउतार याचा तिने कधीच त्रागा केला नाही. तिने कधी कोणतेच नाते तुटण्याइतपत ताणले नाही. पंचवीस माणसाच्या कुटुंबात कधीच तिने नात्या-नात्यात  दुरावा येऊ दिला नाही.  मग जावा-जावा असोत अथवा भाऊ-भाऊ असोत. कधी एकत्र कुटुंबात भांड्याला भांडे लागलेच तर तिच्या काळजाचा थरकाप व्हायचा. तिची चिंता वाढायची. तिने प्रयत्न केले ते पडलेल्या फटींना सांधायचे. मायेचे मलम लावून तिने नात्यांना उभारी दिली. आत्याचे संपुर्ण आयुष्य हे फक्त रांदणे आणि सांधणे यातच गेले. 

आत्याने  आम्हां बहिणींना तिच्या सगळ्या चांगल्या सवयी लावल्या.  तिचेच संस्कार घेऊन आम्ही सासरी नांदायला गेलो. म्हणून मी आज अभिमानानी सांगते, “माझ्यात जे काही चांगले आहे ती आत्याची माझ्याकडे  ठेव आहे. “

आत्याच्या बाबतीत विशेष वाटते ते हे की, स्वतःचे अपत्य नसताना दुसऱ्याच्या लेकरांवर अतोनात प्रेम करणे ,त्यांचे भविष्य चांगले घडावे याकरता सतत  प्रयत्न करणे. दुसर्ऱ्याचे संसार सजविण्यात, सावरण्यात स्वतःचे आयुष्य झिजविणे.  आत्या, हे सारं तूच करू जाणे!  गावात येणारे ग्रामसेवक, तलाठी, शाळेतील शिक्षक, माल विकायला येणारे फिरस्ते यांना कधी आत्यानी उपाशीपोटी जाऊ दिले नाही. हे सगळेजण आत्याला त्यांची मोठी बहीण मानायचे. 

आपले सर्व आयुष्य तिने एकाकी घालविले पण धुतल्या तांदळाप्रमाणे तिचे चारित्र्य आणि मन  होते.

अशी आत्या आज आमच्यात नाही पण तिच्या आठवणी रोज मनास खोलवर हेलावून टाकतात. नकळत डोळे भरून येतात आणि डोळ्यांतून ओघळते ते एका थोर पुण्यवती आईचेच वात्सल्य. “आत्या तू आमच्यात होती म्हणून  पंचवीस माणसाचे कुटुंब चाळीस वर्ष एकत्र होते  “

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा , जि. सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ “आठवण” … लेखक : श्री सुधीर रेवणकर ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

 ☆ “आठवण” … लेखक : श्री सुधीर रेवणकर ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

“ मी वर जाईन ना… तेव्हा आठवतील माझे शब्द. मग बस रडत……. “

‘ दे वो माय ‘ असा शब्द लहानपणी ऐकू आला की आई बोलायची, “ बघ रे काही असेल. एखादी पोळीभाजी देऊन टाक तिला.”

मी नेहमी कंटाळा करायचो.

“ उठतो का आता ? “ मी तणतण करत जे असेल ते द्यायचो. 

“ असे करू नये. आपल्यातला एक घास दुसऱ्याला दिला, तर देव कोणत्याही रुपात येऊन आपल्या ताटात दोन घास टाकून जातो.”

मी उर्मटपणे बोलायचो… “ आई, दोन पोळ्या दिल्यात भिकारणीला. बघू तुझा गणपती बाप्पा किती पोळ्या टाकतो माझ्या ताटात. “

“ आई म्हणायची, मी जिवंत आहे तोपर्यंत टाक. मी गेल्यावर कूण्णाला ही देऊ नको. मी जाईल ना मग आठवतील माझे शब्द.”

दरवेळी भिकारी दारावर आले की जुनी साडी दे, जुनी चादर दे , स्वेटर दे. मग आमचे वादविवाद. वय होत आले, तसे मी तिच्यावर रागावणे कमी केले. दारावरचे भिकारी पण कमी होत गेले. 

मग एक दिवस आई गेली. मी ठरवले तिच्या आवडत्या तीर्थक्षेत्र आणि नद्यांमध्ये अस्थीविसर्जन करायचे. नाशिक, पंढरपूर झाले आणि मी काशीला पोहचलो. भर पावसाळा चालू. मी सगळे विधी करून परत निघालो. ट्रेन सकाळी दहा ला, पण चार तास लेट. मी प्लॅटफॉर्म वरूनच एक व्हेज पुलावचे पॅकेट घेतले. थोडे केळं घेतलेत आणि जिन्याच्या पायरीवर बसून राहिलो. 

काही वेळाने एक बाई आणि कडेवरचे पोरगं माझ्याजवळ थांबून काही खायला मागू लागले.  मी नकळतच पुलाव पॅकेट, पाणी, चार पाच केळी पण तिला देऊन टाकली. दोघे ही पुढे निघून गेलीत. वाराणसी ते ठाणे दीड दिवसांचा प्रवास. स्टेशनं भरपूर. मनात म्हटले, खाऊ काहीतरी नंतर. पाचच्या आसपास ट्रेन आली. मी ज्या कंम्पार्टमेंट मध्ये होतो, तिथे तरुण नवरा नवरी आणि त्याची म्हातारी आई आमच्या गप्पा सुरु झाल्या. त्यांना शिर्डीला जायचे होते.

मी सगळी माहिती सांगितली. त्यांनी पण हिंदीतून विचारले मी का आलो वाराणसीला. मी पण सांगितले की अस्थिविसर्जित करायला आलो होतो. सात वाजता चहा वाला आला. मी दोन कप घेतले बॅगमधून अर्धा उरलेला पार्ले G खाल्ला. परत एक कप चहा प्यायलो. 

आठ-साडेआठला बोगीत सगळ्यांनी डब्बे उघडून खायला सुरवात केली. मी पार्लेवरच झोपणार होतो. पुढच्या स्टेशनला घेऊ बिस्कीट म्हणून शान्त बसलो. इकडे सुनबाई मुलाने डब्बा काढला, पांढऱ्या केसांच्या आजीला बघून मला आईची आठवण येतच होती. 

सून, मुलगा आणि म्हातारीने एकमेकांना खूण केली . पोरीने चार प्लास्टिकच्या प्लेट वाढल्या. पुरी भाजी, चटणी ,लोणचे एक स्वीट, काही फ्रुट कापून प्लेट मध्ये सजवले आणि मुलाने आवाज दिला, “ अंकल हात धो लिजीए और खाना खाईए .”

मी नको नको म्हंटले तरी त्यांनी जेवायलाच लावले. मी पोटभर जेवलो. अवांतर गप्पा झाल्या. मी  वरच्या बर्थ वर झोपायला गेलो. सगळे झोपायला लागलेत. लाईट बंद झालेत. मी चादरीच्या कोपऱ्यातून हळूच खाली पाहिले. म्हातारी सेम टू सेम..

डोक्याखाली हाताची उशी घेऊन झोपलेली. अगदी माझ्या आईची आवडती सवय. आपण एक घास कोणाला दिला तर देव कोणत्याही रुपात येऊन आपल्या ताटात दोन घास टाकतो. एक छोटे पॅकेट काय त्या मायलेकाला दिले तर आजीबाईने ताट भरून जेवू घातले. 

बाहेर चिक्कार पाऊस आणि गेले दोन महिने आईच्या आठवणींचा मनात रोखलेला पाऊस दोघेही मग डोळ्यावाटे मुसळधार बरसू लागलेत. 

आई नेहमी म्हणायची…. “ मी जाईन ना वर, तेव्हा आठवतील माझे शब्द. मग बस रडत….. “

लेखक : श्री सुधीर रेवणकर

संग्राहक : श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘कान’ गोष्ट’…. ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

‘’कान’ गोष्ट…☆ सुश्री नीता कुलकर्णी ☆

आपण आपल्या अवयवांबद्दल कुठली ना कुठली विधानं करत असतो. 

पाणीदार डोळे, धारदार नाक, लांबसडक बोटे,गुलाबी गाल वगैरे…

कान हा जो आपला दर्शनी अवयव आहे त्याच्याकडे आपला कानाडोळा  होतो. 

आणि बोललं तरी चांगलं असं काही कोणी बोलत नाही.

…गुपित सांगायचं असेल तर आपण म्हणतो 

“जरा कान इकडे कर ” – आणि हळू आवाजात ते सांगतो.

अर्थात इतकी गुप्त गोष्ट कोणाच्या पोटात राहात नाही …

कधी एकदा ती दुसऱ्याला सांगतो अस त्याला होतं मग तो दुसऱ्याच्या कानाला लागतो….

लहान मुलींच्या वर्गात बाई येतात. अभ्यासाला सुरुवात करायची असते.

 एक मुलगी दुसरीच्या कानाजवळ हाताचा आडोसा करून म्हणते

 “आज बाई किती छान दिसत आहेत.”..

बाई विचारतात 

“काय कान गोष्टी चालल्या आहेत ?” – मुली नुसत्या हसतात…

एखादा आपली साक्ष काढतो म्हणतो..  ” त्या दिवशी काय झालं तुला माहित आहे ना?”

आपण कान झाकून घेत ” मला काही माहीत नाही ” – असं म्हणून त्या प्रसंगातून आपली सुटका करून घेतो… वर त्याला म्हणतो – 

“तसं माझ्या कानावरून गेल आहे, पण कान आणि डोळे यात चार बोटाचे अंतर असतं .. मी प्रत्यक्ष पाहिलेलं नाही .तुला ते शपथेवर काही सांगू शकत नाही.”

…. म्हणजे पुराव्याच्या बाबतीत नुसत्या कानाची साक्ष ग्राह्य धरली जात नाही.

तसंच एखाद्याचं कानफाट्या नाव पडलं की तो कितीही चांगला वागला तरी उपयोग नसतो …

तो कानफाट्याच —

इंग्रजीमध्ये दोन शब्द आहेत

“ लिसन आणि हियर “

हियरचा अर्थ कानावर जे पडले ते नुसते  ऐकणे  असा आहे.आणि लिसनचा अर्थ लक्षपूर्वक ऐकणे असा आहे .– लिसन हे कानातून मेंदूपर्यंत जाते, तेथून ते हृदयापर्यंत पोहोचते आणि योग्य कृती होते.

मैत्रिणीची तरुण मुलगी एखाद्या मुलाबरोबर फिरताना दिसते .आपण मैत्रिणीला फोन करून तिच्या हे कानावर घालतो .— म्हणजे पुढे काय करायचे ते तिने बघावं .लेक चुकत असेल तर मैत्रिणीनी तिचा कान धरावा असं आपल्याला वाटतं.

थोड्या दिवसात एखादीचं महत्त्व वाढलं किंवा जास्त शहाणपणा करायला लागली की आपण म्हणतो “कानामागून आली आणि तिखट झाली…”

काहीवेळा आपलं बोलणं दुसऱ्याच्या कानावर जावं असं वाटत असतं.–  त्यावेळी ती  व्यक्ती आसपास आहे याची खात्री करून आपण मुद्दाम मोठ्यांदा बोलतो आणि आपला उद्देश सफल करून घेतो.

लिहिता लिहिता एक गाणं आठवलं —- 

‘रानात सांग कानात ,आपुले नाते

मी भल्या पहाटे येते ‘

खरं तर भल्या पहाटे त्यांचं बोलणं ऐकायला तिथं कोण येणार आहे? – तरी तो तिला कानातच सांगायला सांगतो ….

तसं ऐकण्यात जवळीक आहे ..  प्रेम आहे .. त्याला स्पर्शाची साथ आहे आणि अजून बरंच  काही आहे…..

कानात सांगितलेलं मनात ठेवायचं असतं .. .प्रेमिकांचं ते गोड गुपीत असतं.

नवीन लग्न झालेली जोडपी बघा .. एकमेकात रमून गेलेली असतात. एकमेकांचं बोलणं कानात प्राण आणून ऐकत असतात..

काही लोक मात्र फार हुशार असतात. त्यांची काम कशी या कानाची त्या कानाला कळत नाहीत.

कानाखाली जाळ काढीन किंवा  कानाखाली आवाज काढीन असं  म्हणतात… पण हा आवाज कुठे आणि कसा काढला जातो हे मात्र मला माहीत नाही. 

पूर्वी आजोबा नातवंडांना सांगायचे — ” मी काय सांगतो ते कान देऊन ऐका.  उगीच कानामागे टाकू नका”

मुलही आजोबांचा ऐकत असत.— कारण त्यावेळी कानाचा उपयोग शिक्षा देण्यासाठी सर्रास केला जात असे .आजोबांच ऐकलं नाही तर ते कान धरतील नाहीतर पीरगाळतील ही भीती असायची.

आजही एखाद्याकडून चूक झाली तर तो म्हणतो 

” वाटलं तर कान पकडून माफी मागतो मग तर झालं…”

म्हणजे अप्रत्यक्षरीत्या शिक्षेसाठी अजूनही प्रतीकात्मक का होईना कान धरला जातो …

वर तो म्हणतो … “आता कानाला खडा…परत अस होणार नाही.”

एखाद्यावेळेस अ ब च्या कानात क विषयी विष ओततो .त्याचे कान भरतो. क जर विचारी असेल तर तो त्याचे ऐकत नाही, पण तसा नसेल आणि अ च्या विचाराने क शी बोलला तर त्याचे नुकसान होते.

— अशा लोकांकडे कानाडोळाच करायला पाहिजे. नाहीतर त्यांची चांगलीच कानउघाडणी केली पाहिजे .हलक्या कानाच्या लोकांपासून सावध राहायला हवं.

एखाद्याचा स्वभाव सारखा तक्रार करण्याचा असतो .त्याचं बोलणं आपण या कानाने ऐकतो आणि त्या कानाने सोडून देतो.

समाजात ‘ बळी तो कान पिळी ‘ असतो. याचं प्रत्यंतर आपल्याला रोजच्या जीवनात येत असते.

कान ही खरं तर मोठी देणगी आहे…पण त्याचं आपल्याला काही विशेष वाटत नाही. 

मुकबधिरांकडे बघितलं की…त्यांच्याबरोबर अर्धा तास जरी थांबलो  तरी —  आपल्याला कान आहेत .. 

ऐकू येत आहे …  हे किती भाग्य आहे हे नीट समजेल…

तर असं  हे कान महात्म्य…

रामदास स्वामींनी लिहिले आहे — 

श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनम्

अर्चनं वंदनं दास्य सख्यमात्मनिवेदनम् – 

म्हणजे नवविधा भक्तीचं वर्णन करताना त्यांनी  श्रवणभक्तीला प्रथम स्थान दिलं आहे.

आपल्याला नको असते ते  पण आपल्या कानावर पडतच असते.–  पण आपण आपल्याला जे योग्य  वाटते ते ऐकावे ….तात्पर्य काय कानाचा चांगला उपयोग केला तर वागणे नीट होते.

 सुदृढ विचार वाढीस लागतात. आपल्या व्यक्तिमत्त्वात बदल होतो…

 कानाचा कसा उपयोग करायचा हे आपल्या हातात आहे.

आपण कसे ऐकावे ते समर्थ दासबोधात सांगतात…

ऐसे हे अवघेची ऐकावे

परंतु सार शोधून घ्यावे

असार ते जाणोनी त्यागावे

या नाव श्रवणभक्ती…

समर्थांचे ऐकू या — शहाणे होऊ या… 

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डाह्याकाका ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

??

☆ डाह्याकाका ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

खरंतर डाह्याकाका हे माझे सख्खे काका नव्हते. सुरतेला माझ्या मावस भाऊबहिणींचे ते काका होते. माझ्या मावशीचे दीर. आम्ही लहानपणी सुट्टीत मावशीकडे जाऊन रहायचो. मग ते आमचेही काका झाले. छोट्या चणीचे. थोडेसेच जाडगेलेसे, विशेषतः त्यांचा खालचा ओठ खूपच जाड. फारसे चपळ नसलेले त्याला कारण होतं, दुर्दैवाने ते थोडेसे मंदबुद्धी होते. याचा अर्थ त्यांना कळत नसे असं नाही. सगळं कळत असे. पण स्वतःची हुशारी कमी. कोण्या विद्वानाने त्यांचं नाव डाह्याकाका ठेवलं होतं कुणास ठाऊक!! डाह्यो म्हणजे गुजरातीत शहाणा. डाह्यो मारो छोकरो वा डाही मारी छोकरी हे म्हटलं जातं, शहाणं माझं बाळ या अर्थाने. मात्र डाह्याकाकांना ते चपखल बसत नव्हतं. त्यांचं खरं नाव हसमुखराय होतं. ते मात्र त्यांना शोभून दिसणारं. ते सदा हसतमुख असायचे. इतकं चांगलं नाव असूनही सगळे त्यांना डाह्याकाकाच म्हणायचे. 

सुरतेला मावश्यांकडे भिक्षुकी होती. खत्री (क्षत्रियो) जातीचे ते गुरूजी लागत. बहुतेक तालेवार घराणी. कुणाची कापडाची मिल, कुणाचा मसाल्याचा व्यापार. व्यापार उदीम बरोबर नोकरी वा छोटेमोठे धंदे करणारे सर्वसामान्य ही खूप. सगळे देवभोळे. साधी घराच्या खिडकीची चौकट बदलायची असेल तरी त्यांना ग्रह नक्षत्र, मुहूर्त लागायचा. माहेरी चार दिवस रहायला आलेल्या मुलीला सासरी  पाठवायची असेल तरी गुरूजींना विचारायला यायचे की कोणत्या दिवशी पाठवू. मग मावशे म्हणायचे, की, तुला मुलगी जड झालीय का?राहू दे दोन दिवस अधिक, परवाचा मुहूर्त चांगला आहे तेव्हा पाठव. यजमान त्यालाही मान डोलवायचे.पत्रिका बघणे व त्यातून यजमानांची कामे मार्गी लावणे. हा व्यवसाय. म्हणतात की लग्नाच्या गाठी स्वर्गात पडतात. मात्र खत्री समाजात लग्नाच्या गाठी मात्र मावशेच पत्रिकेवरून लावून द्यायचे.  एक आषाढ महिना सोडला तर मावशेंना कामाची धामधूम असायची सदैव. कुणाकडे सत्यनारायण वा चंडीपाठ, कुणाकडे वास्तुशांती, क्रियाकर्म, लग्नसराईत तर एका दिवसात चौदा चौदा लग्न लावलेली मी पाहिली आहेत. महिना दीड महिन्यात तर शेकड्यांनी. मग दीडेक वर्षात तिच मंडळी परत यायची. मुलगी वा सुनेचं खोळा भरण कार्यक्रमासाठी. मग मावश्यांना आठवायचं. ह्यांच्याकडे मुलगी दिलीय तेच ना. मग सासर माहेर दोन्ही घरांकडून दक्षिणा मिळायची. भिक्षुकी म्हटली की पूजापाठ  झाले की घरी यायचा तो शिधा. त्यात सप्तधान्य, गुळ खोबरं, साजूक तूप, सुकामेवा यांच्या झोळ्या असायच्या.  फळफळावळ, मिठाईचे बॉक्स वेगळे. मग डाह्याकाकांकडे या झोळ्या सुट्या करून त्यातील सामान व्यवस्थित डब्यांमधे भरणे हा उद्योग असायचा. कधीकधी तर त्यांना ते करताना दिवस पुरायचा.  शिधा सुटा करताना त्यात गुप्त दान म्हणून सुटे पैसे असायचे. ते मात्र डाह्याकाका खिशात घालायचे. हे सर्वांना ठाऊक होतं. मग ते त्या पैशांतून दाढी, कटिंग करून घ्यायचे. ते नेहेमी क्लीन शेव करूनच यायचे. शिधा सुटा करताना सुकामेव्यातील, काजू बदाम, बेदाणे थोडेफार फस्तही करत. मिठाई वरही ताव मारत. सगळे त्याकडे काणाडोळा करत. बऱ्याच वेळा त्यावरून कसं पकडलं वगैरे चेष्टा करत मग हसमुखराय छानपैकी हसत. 

माझे मावसभाऊबहिणी, चार भावंडं, त्यांच्या अंगाखांद्यावर खेळूनच मोठे झालेत. त्यांना तर त्यांचा विशेष लळा होता व आदराचे स्थानही. दिवसातून कुणी ना कुणी सारखं त्यांची दखल घ्यायचं. डाह्याकाकांना तितकंच बरं वाटे. ते फारसं कधी बोलत नसे. आपण काही विचारलं तर पच म्हणजे हो, वा पचपच म्हणजे नाही. असं मोजकंच बोलणं होई. मात्र घरात सगळे एकत्र बसून चर्चा करत असतील तर लक्षपूर्वक ऐकत व मधून एखादं वाक्य बोलून जात. ते तितकं महत्वाचं नसायचं पण आपली उपस्थिती नोंदवायची त्यांची तऱ्हा होती. काम नसलं की ते ओट्यावर जाऊन बसायचे. ओटा पुरूषभर ऊंच होता. त्यावरून ते वाहती वर्दळ बघत बसायचे. आपण अवचित गेलो की छानपैकी हसून स्वागत करायचे. 

डाह्याकाकांकडे देवपूजेचा मान होता. सकाळीस आंघोळ झाली की गंध उगाळून देवपूजेला बसायचे. मावशीकडे देवघर मोठे असलेले. फळ्यांची चढणच. त्यावर तितकेच देव. ते सर्व देव ताम्हणात घेऊन त्यांना आंघोळ घालून, स्वच्छ पुसून, गंध हळदीकुंकू लावून फळ्यांवर ठेवायची. मग फुलं वाहून, धूप, दीप, आरती गुळखोबरं फळं याचा नैवेद्य सगळं साग्रसंगीत करायचे.  सर्वात वरच्या फळीवर, गणपती, देवी व लंगडा बाळकृष्णाचा मान. बहुतेकदा ते रंगनाथ वर ठेवताना गडगडून खाली यायचा. मग मावशे म्हणायचे, बघ देवाला आज तुझ्या बरोबर खेळायचंय त्यावरही हसमुखराय हसायचे. 

डाह्याकाका व मावशीचं एक अनोखं नातं होतं. ते दीर असले तरी मावशींनी त्यांना आपलं मुलच मानलं होतं. ती नेहेमी त्यांना जपायची. त्यांना लागलं खुपलं ते लगेच द्यायची. डाह्याभई अशी हाक मारली की डाह्याकाका कुठेही असले तर लगेच हजर व्हायचे. मावशीचं, घरातलं कोणतंही काम विनातक्रार करायचे. पण ते सांगकामे नव्हते. मावशींनी त्यांचा तेवढा आब राखला होता. घरात काही चांगला पदार्थ बनवला तर तो चाखण्याचा मान डाह्याकाकांचा असायचा. जेवण वाढतानाही मावशी त्यांच्या पोळीवर जास्त तूप लावून द्यायची. ते त्यांच्या लक्षात यायचं. तितकेच ते खुश होऊन जायचे. 

डाह्याकाकांनी कधीच काही मागण्या केल्या नाहीत ना कुठलाही हट्ट. कापडचोपड यजमानांकडून यायचं त्यातून सदरा व लेंघा शिवून घ्यायचे. गरजा कमीच. चार गोड शब्द बोलले की गडी खुश. चार भिंतीमधलं आयुष्य ते आनंदाने जगले. भाचे मंडळींनी देवदर्शनाला वा बागेत नेले तर जायचे. वर्षातून एकदा लांब आजोळी महिनाभर राहून यायचे. तेव्हा ताप्ती रेल्वेलाईनची मजा अनुभवायचे. असं सगळं असलं तरी त्यांना रागलोभ ही होताच. कधी काही मनाप्रमाणे नाही झालं की रूसायचे. मग एका कोपऱ्यात बसून राहायचे. कोणी पाहत नाही हे पाहून हळूच डोळे पुसायचे. हे मावशीच्या लक्षात यायचे. मग त्या, “ काय डाह्याभई? ” म्हटलं की घळाघळा रडायचे पण ते तेवढ्यापुरतंच. मग आभाळभर हसायचे. २००५साली सुरतेत तापीला महापूर आला होता. मोठं नुकसान झालं. बरीच रोगराई पसरून बरीच माणसं मेली होती. डाह्याकाका वार्धक्यामुळे वारले तर त्यांना सोवळ्यात नेले होते. खांदेकरी ही सोवळ्यात. स्मशानात बरीच गर्दी होती. डाह्याकाकांना नेलं तेव्हा सगळी गर्दी बाजूला झाली. ब्राह्मणाचं आलेलं दिसतंय म्हणत. स्मशानातही त्यांना मान मिळाला. असं मानाचं जगणं जगले व गेले तेही मानाने. 

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तिळगूळ घ्या…अन…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “तिळगूळ घ्या…अन…” ☆ श्री मंगेश मधुकर

“तिळगूळ घ्या….”

“नमस्कार” हऱ्यानं हात जोडले.

“हाय” उजव्या हाताचा पंजा हलवत नाऱ्यानं प्रतिसाद दिला.  

“आज एकदम इंग्लिश”

“आपलं असंच असतं”

“रात्रीची उतरली नाही वाटतं”

“काहीही समज.फरक पडत नाही.”

“तिळगूळ घ्या ..”हऱ्या

“पुढचं नको”

“का?”

“मी नेहमीच गोड बोलतो.”

“ते माहितीये.आधी काय म्हणतोय ते ऐकून तर घे”

“बरं,बोल” 

“तिळगूळ घ्या अन खरं बोला.”

“हे अवघड आहे. त्यापेक्षा तिळगूळ परत घे .”

“सपशेल माघार”

“तुझी अपेक्षाच चुकीची आहे”

“काहीही काय”हऱ्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह?

“बाकी काहीही सांग पण खरं बोलायचं म्हणजे.. नको रे बाबा” 

“एवढं अवघड आहे.”

“अवघड नव्हे अशक्य”

“का?”

“खरं बोला.तुला सांगायला काय जातं पण बोललेलं समोरच्याला खरं वाटेल याची खात्री नाही आणि इथंच सगळा घोळयं. प्रत्येकजण सोयीनं बोलतो ”

“म्हणजे नाटकी.दिखाव्याची दुनिया..”हऱ्या

“कटू असलं तरी हेच वास्तव आहे”

“मग गोड बोला..”

“खरं सांगू.गोड बोलणाऱ्यांची तर भीतीच वाटते.कामापुरतं गोड बोलणार आणि नंतर….हम आपके हैं कौन ”

“खरा कोण?खोटा कोण?समजत नाही.”हऱ्या

“मी राजकारण्यांविषयी बोलत नाही.त्यांच्याशी आपल्याला काही देणं-घेणं नाही.आपण औट घटकेचे राजे.मत दिल्यावर आपली अवस्था टिश्यू पेपर सारखी.”

“पण याच लोकांच्या हातात आपलं भविष्य आहे ना.नक्की कोणावर विश्वास ठेवायचा.” हऱ्या

“कोणावरच नाही.नशिबावर सोडून द्यायचं.सब घोडे बारा टक्के.नेतेमंडळी म्हणजे एकापेक्षा एक नटसम्राट..त्यांच्या  खेळातली आपण प्यादी. त्यांच्याविषयी जास्त बोलायला नको. कधी,कोठे अन कोणाला राग येईल आणि भावना दुखावतील याचा नेम राहिलेला नाही.”

“विषय भरकटला ना राव.आपण खरं बोलण्याविषयी  चाललं होतं .” हऱ्या

“हो,सध्या अशी परिस्थिती आहे की,घरी दारी सगळीकडे मुखवटा लावलेला.सारखं मुखवट्याआड लपल्यानं खरा चेहरा लक्षात येत नाही.” 

“हंsssम ”

“एकूणच काय तर एकमेकांवरचा विश्वास कमी होतोय.”

“झपाट्यानं”

“आपल्या मनमोकळं बोलण्याचा गैरफायदा तर घेणार नाही ना ही भीती सतत वाटते.”

“असं का पण..”हऱ्या 

“मी,मला,माझं याला आलेलं महत्व आणि जगण्यातली वाढती अनिश्चितता त्यामुळे ठायी ठायी आलेला तात्पुरतेपणा”

“हे काय नवीन..”

“नवीन नाही जुनंच आहे.जरा बारकाईने पाहिलं तर लक्षात येईल की सगळ्या गोष्टी उदा.आनंद,दु:ख,राग,संताप हे फार वरवर आणि उथळ झालंय तर ईगो स्ट्रॉंग आणि नाती भुसभुशीत झालीय.”

“त्यामुळचं माणसं सतत सैरभैर असतात.” हऱ्या

“कोणत्याच गोष्टीत जास्त वेळ रमत नाहीत.लगेच बोर होतात.कोणत्याही कारणानं रागवतात अन लगेच शांतही होतात.बऱ्याचदा विचार न करता रिऍक्ट होण्याचं प्रमाण फार वाढलंय.तासनतास चॅटिंग करतील पण समोरासमोर बोलणार नाहीत.”

“डिजिटल संवाद वाढला पण सुसंवाद हरवला” हऱ्या 

“आहाहाहा,काय तर बोलालास.एकदम पुस्तकी वाक्य ..”

“माणूस कितीही आधुनिक झाला तरी अजूनही भावना तशाच आहेत.परस्परांविषयी प्रेम,माया,ममत्व वाटतचं आणि त्यात कधीच बदल होणार नाही.वाईट एवढंच की व्यवहाराला महत्व दिल्यानं नात्याची घट्ट वीण उसवायला सुरवात झाली”

“हो याचा अनुभव घेतलाय.आईबापांना आपल्याच मुलांशी बोलायला भीती वाटते”

“नवीन जमान्याची नवीन दुखणी”

“असो…माणसानं स्वतःशी प्रामाणिक राहिलं पाहिजे.”

 हऱ्या तिळाची वडी नाऱ्याच्या हातात ठेवत म्हणाला “आपण परंपरा मोडायची नाही. तिळगूळ घ्या…..”लगेच नाऱ्या ओरडला “अन  चांगलं बोला …. “

मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !! तिळगूळ घ्या .. छान छान वाचत रहा

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य जगायला नेमकं काय लागतं ? – भाग-२ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य जगायला नेमकं काय लागतं ? – भाग-२ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

वैद्यकीय

  1.   रस्त्यावर असहायपणे पडलेल्या अनेक रुग्णांना हॉस्पिटलमध्ये विविध प्रकारचे उपचार देण्यात आले.
  2. ज्यांना अजिबातच ऐकायला येत नाही अशी अनेक वृद्ध मंडळी मला रस्त्यात भेटतात. रस्त्यावरून चालताना रस्ता ओलांडताना किंवा इतर अनेक वेळी ऐकूच न आल्यामुळे अपघात होतात त्यात बऱ्याच वेळा हात पाय मोडले जातात.

अशा सर्वांना एक एक करून मांडके हियरिंग सर्विसेस या प्रथितयश संस्थेतून कानाची तपासणी करून घेत आहोत आणि योग्य त्या व्यक्तींना कानाची मशीन देत आहोत. 

ऐकू यायला लागल्यानंतर ही माणसं छोटे छोटे आवाज सुद्धा कौतुकाने ऐकत राहतात. रस्त्यावरून चालणाऱ्या गाड्यांचा गोंगाट… हॉर्नचा कर्ण कर्कश्श आवाज… स्पीकरवर जोरजोरात लागलेली गाणी… एरव्ही कोणालाही या सर्वाचा त्रास होईल, परंतु त्यांना हे आवाज ऐकताना खूप आनंद होतो…! 

  1. ज्यांना दिसत नाही अशा अनेक वृद्धांना रासकर डोळ्यांचे हॉस्पिटल किंवा लेले हॉस्पिटल येथे घेऊन जाऊन त्यांच्या डोळ्यांच्या तपासण्या करत आहोत, चष्मे देत आहोत आणि मोतीबिंदू ऑपरेशन सुद्धा करून घेत आहोत.

दिसायला लागल्यानंतर यांना काय पाहू आणि काय नको असं होतं…

भिंतींचे रंग, गाड्यांचे रंग, आकाशाचा रंग, घातलेल्या कपड्याचे रंग… एरव्ही या गोष्टी सुध्दा कोणी इतक्या बारकाईने पाहत नाही परंतु याच गोष्टींचं त्यांना किती अप्रूप…! 

बरोबर आहे, ज्याच्याकडे जी गोष्ट आहे त्याला त्याची किंमत नसते… 

उपाशी असलेल्यालाच चतकोर भाकरीची किंमत जास्त कळते… 

शेवटी काय, आनंद आणि सुख याची खरी अनुभूती त्यालाच येते ज्याने या अगोदर दुःख पचवली आहेत…! 

  1. कुंडीतीलं झाड अतिशय सुरक्षित वातावरणात जगत असतं, पण ते कुणीतरी पाणी घालण्याची वाट पाहत असतं, परंतु जमिनीवर उगवलेलं झाड मात्र जमिनीतला ओलावा शोषून जगतं…!

अशीच जमिनीतला ओलावा घेवुन जगणारी… रस्त्यावर राहणारी वृद्ध माणसं… माझे मित्र श्री नितीन पाटील यांच्या सहकार्याने, त्यांच्या वाढदिवसानिमित्त, अतिशय उत्तम क्वालिटीची ब्लॅंकेट या सर्वांना देऊन त्यांच्या अंगावर मायेचं पांघरुण घालता आलं…

अन्नपूर्णा प्रकल्प

आमच्या अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही रस्त्यांवर नाईलाजाने जगत असलेल्या आई बाबा, भाऊ बहिण यांना किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणाऱ्या किमान २०० गोरगरीबांना, दररोज…. जेवणाचे डबे हातात देत आहोत. 

आयुष्याच्या वाटेवर भेटलेले, श्री अमोल शेरेकर, हे फक्त शरीरानेच दिव्यांग आहेत. बाकी आत्मविश्वास एखाद्या धडधाकट माणसाला सुद्धा लाजवेल. 

अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून या कुटुंबाला आपण व्यवसाय सुरू करून दिला आहे.

अमोल यांची पत्नी घरात जेवण तयार करते आणि श्री अमोल शेरेकर पॅकिंग करून रुग्णालयातील भुकेल्या गरिबांच्या हातात हे डबे नेवुन देतात. 

It’s our win-win situation

इकडे एका कुटुंबाला उत्पन्न मिळाले, जगण्यासाठी सहाय्य मिळाले आणि तिकडे भुकेने तडफडणाऱ्या लोकांना अन्न मिळाले.

खरंच जेवणाच्या एका घासाने किती जणांना जगवले…. !

खराटा पलटण

खराटा पलटण म्हणजेच Community Cleanliness Team ! 

अंगात व्यवसाय किंवा नोकरीचे कोणतेही कौशल्य नसणाऱ्या प्रौढ / वृध्द महिलांची एक मोळी बांधून, त्यांच्याकडून पुण्यातील अस्वच्छ भाग स्वच्छ करून घेत आहोत, त्या बदल्यात त्यांना पगार किंवा किराणा माल देत आहोत. 

या महिन्यातही खराटा पलटणाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी स्वच्छता केली आहे आणि त्या बदल्यात टीममधील प्रत्येकाला पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधा दिला आहे. 

आपण सर्वांनी सुद्धा कोणतीही गोष्ट “भीक” म्हणून देण्यापेक्षा त्यांना सन्मानानं “मजुरी” द्यावी अशी माझी आपणास विनंती आहे. 

आमच्या या सर्व महिला पुणे महानगरपालिकेच्या “स्वच्छता अभियान च्या ब्रँड अँबेसिडर” म्हणून सध्या चमकत आहेत. 

या संपूर्ण वर्षात कधी भंगारवाला झालो आणि उकिरड्यात टाकलेल्या वस्तू गोळा करून त्यांना जोडत गेलो… कधी पोस्टमन होऊन आपली मदत योग्य त्या पत्त्यावर पोहोचवली…. आणि वर्षभराचा लेखाजोखा आपल्यासमोर मांडत गेलो…! 

उजाले मे मिल जाते हैं लाखों यहाँ…

अहसान उनका मानो जिन्होने अंधेरे मे साथ दिया…

आमच्या या धडपडीला तुमची साथ मिळाली… विनाअट विना अपेक्षा आपण कोणत्या न कोणत्या स्वरूपात आम्हाला मदत करत गेलात, ऋण कसं फेडावं तुमचं…??? 

काही वेळा मला असं वाटतं, की आपण एकाच घड्याळाचे काटे आहोत…. प्रत्येक काट्याची उंची वेगळी, गती वेगळी, रुप वेगळे, रंग वेगळा…. 

तरीही घड्याळाच्या मध्यबिंदूवर आपण एकमेकांशी घट्ट जोडले गेलो आहोत…. हा मध्यबिंदू आहे माणुसकीचा…!!!

आणि उंची, गती, रूप, रंग वेगळा असेलही परंतु, घड्याळाच्या या एका परिघात आपण एकत्र राहून एकाच दिशेने चाललो आहोत…

वर्षभरात नकळतपणे आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर आम्ही मनापासून माफी मागत आहोत… मोठ्या मनानं माफ करावं…. !

सरत्या वर्षाचे धन्यवाद, येणाऱ्या वर्षाला अभिवादन आणि आपणा सर्वांना प्रणाम. 

नवीन वर्षाच्या आपणास शुभेच्छा… !!! 

प्रणाम  !!!

– समाप्त – 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य जगायला नेमकं काय लागतं ? – भाग-१ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य जगायला नेमकं काय लागतं ? – भाग-१ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

आज 31 डिसेंबर 2023, उद्या एक जानेवारी 2024… दोन दिवसातलं अंतर फक्त 24 तासंच…. या दिवसापासून त्या दिवसाकडे पोहोचायला मात्र वर्षभर वाट पहावी लागली… ! 

शिखरावर जाऊन झेंडा रोवायचं काम फक्त एक मिनिटाचं… पण त्यासाठी जीव धोक्यात घालून अख्खा डोंगर चढायला लागतो, तसंच काहीसं हे…! 

झेंडा रोवण्यापेक्षा जीव धोक्यात घालून तुम्ही कसे चाललात हे जास्त महत्त्वाचं….! 

किनाऱ्याशी आल्यावर, किनारा आणि नाव यामध्ये अंतर फक्त एका पावलाचं असतं… पण त्या अगोदर अख्खी नदी पालथी घालताना; वल्ही मारून धाप लागलेली असताना, तुम्ही कसे तरलात हे जास्त महत्त्वाचं…!!

एखाद्या ठिकाणी पोचण्यापेक्षा, पोचण्यासाठी केलेला प्रवास, वाटेत आलेल्या अडचणींचा सामना म्हणजे आयुष्य…! 

आयुष्य जगायला नेमकं काय लागतं ? तर ज्ञान आणि भान… 

कोणत्या वेळी काय करावं, याचं “भान”म्हणजे “ज्ञान”…

आणि कोणत्या वेळी काय करू नये, याचं “ज्ञान” म्हणजे “भान”…! 

गाडी जोरात पळवायची असेल तर काय महत्त्वाचं ?एक्सीलेटर ??…मुळीच नाही…! 

गाडी जोरात पळवायची असेल, तर सर्वात महत्त्वाचा असतो तो ब्रेक…! 

निष्णात ड्रायव्हर, गाडी सुरू केल्यानंतर पहिल्यांदा चेक करतो तो ब्रेक…

थांबण्याची खात्री असेल, तरच त्या जोरात पळण्याला अर्थ आहे…  ब्रेकच नसेल तर पुढे जाऊन आदळणार हे नक्की…

गाडी चालवणं हे झालं “ज्ञान” आणि योग्य वेळी ब्रेक दाबून थांबणं हे झालं “भान”…! 

ज्ञान आणि भानाचं समीकरण एकदा कळलं की आयुष्यातलं गणित सोपं होवुन जातं….

ज्ञान असूनही भान हरवलेली किंवा भान असूनही ज्ञान नसलेली अनेक मंडळी या वर्षभरात मला भेटली… अनेक भले बुरे अनुभव आले आणि मी त्यातून समृद्ध होत गेलो. 

अनेक भल्या भुऱ्या गोष्टी या वर्षाने माझ्या झोळीत घेत गेलो….

डिसेंबर महिन्यात आपल्या साथीने घडलेल्या घटनांचा हा लेखाजोखा आपणास सविनय सादर…

भिक्षेकरी ते कष्टकरी

  1. थंडीसाठी स्वेटर विणायला घ्यावं आणि थंडी निघून गेली तरीही काही कारणानं ते अपूर्णच राहावं… अशी अनेक अपूर्ण आयुष्यं आजूबाजूला दिसतात…

अशीच एक प्रौढ महिला….

बालपण आणि तरुणपण काबाडकष्ट करून आई-वडिलांना जगवण्यात गेलं…. कालांतराने आई वडील गेले; पुढे हिला अपंगत्व आलं. 

कुणी नोकरी देईना आणि स्वतःचा व्यवसाय टाकण्यासाठी भांडवल नाही…. शेवटी नाईलाजाने जगण्यासाठी शनिवार वाडा परिसरात भीक मागायला सुरुवात केली. 

28 डिसेंबर रोजी छप्पर असलेली एक हातगाडी आणि विक्री योग्य सामान तिला घेऊन दिले आहे, ती आता त्या गाडीत बसून व्यवसाय करुन सन्मानानं जगते आहे. 

चला, बऱ्याच वर्षांपासून अपूर्ण राहिलेलं स्वेटर आज तुम्हा सर्वांच्या साथीने या थंडीत विणून पूर्ण झालं….! 

  1. चार अंध ताईं आणि एक दादा यांना या महिन्यात नवीन वर्षाचे कॅलेंडर विकायला दिले. यांचं”न्यू इयर”…” हॅप्पी” करण्याचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न…!
  2. सध्या जातीवरून”राजकारण” सुरू आहे, आम्ही जातींचा उपयोग करुन”समाजकारण” करत आहोत…

चर्मकार समाजाचे एक आजोबा रस्त्यात भीक मागत आयुष्य जगत होते, त्यांना चप्पल विक्रीचा व्यवसाय टाकून दिला आहे…. 

नाभिक समाजाचे दुसरे आजोबा रस्त्यावर भीक मागत होते, त्यांना केश कर्तन आणि दाढी कटिंगचा व्यवसाय टाकून दिला आहे…. 

ज्या ठिकाणी हे लोक भीक मागतात…. शक्यतो त्याच ठिकाणी मी त्यांना व्यवसाय टाकून देतो…. 

ज्या मातीत हजारदा आयुष्याची कुस्ती हरलो…. त्याच मातीत, त्याच जागेवर जिंकण्याची नशा काही और असते…! 

जमिनीला पाठ लागली म्हणुन कुणी हरत नसतं… पडूनही न उठणं म्हणजे हरणं….! 

वरील आठही व्यक्तींच्या चेहऱ्यावरचं समाधान घेवून आम्ही 31 डिसेंबर साजरा करत आहोत. 

आयुष्यातलं आणखी एक वर्ष संपलं…. ???  संपू दे…. . पर्वा कुणाला….? 

आठ नवीन आयुष्यं उभी राहिली या नशेत आम्ही अजून झुलतो आहोत…! 

– क्रमशः भाग पहिला  

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ धागेदोरे… ☆ सुश्री सुनीता पाटणकर

सौ. सुनीता पाटणकर

? मनमंजुषेतून ?

☆ धागेदोरे… ☆ सुश्री सुनीता पाटणकर ☆

धागेदोरे तीनशे पासष्ट दिवसांचे, विणतो आपण …. 

सुख दुःखाचे, प्रेमाचे, आनंदाचे,

मैत्र जोडतो, कधी फटकारतो, रुसतो, भुलतो,

कधी ताणतात, कधी सैलावतात, बंध‌ नात्याचे,

 

पौष घेऊन येतो संक्रांत,

” तिळगुळ घ्या अन् गोड बोला म्हणत.”……..

हळदीकुंकू वाण, दागिने हलव्याचे, आणि रथसप्तमी सूर्याची आराधना,

 

येई फाल्गुन .. … प्रेमरंगात रंगे रंगपंचमी,

भलेबुरे जाळायला होळी,

 

चैत्राची पालवी फुटली, गुढीपाडव्याला गुढी उभारली,

गुढी ऐक्याची, सद् भावाची, देशभक्तीची,

सुरु होतं हिंदू नववर्ष,

चैत्रागौर, हळदीकुंकू, डाळ, पन्ह, उसळ हरभऱ्याची,

 

हापूस, पायरीचे आगमन, घरोघरी आमरस पुरीचे जेवण,

वैशाखाचे रणरण ऊन,

परीक्षा,अभ्यास, सुट्टी, निकाल, धामधुम,

 

पावसाची चाहूल, रिमझिम, रिपरिप,

कृषीवलांची‌ लगबग, नांगरणी, पेरणी,

मुलांची सुट्टी संपली, शाळा, कॉलेज, रेनकोट,छत्री, पुस्तक,वह्या, गणवेश,

 

जेष्ठाचे आगमन,… ललनांची‌ वटसावित्री,

आषाढस्य प्रथम दिवसे म्हणत, येणारा मेघदूत,

निसर्गपूजा, बैलांचे कौतुक बैलपोळा.. 

 

श्रावण आला, पूजा नागोबाला…. 

सोमवारी शिवामूठ, मंगळवारी मंगळागौरी,

बृहस्पति पूजा बुधवारी, शुक्रवारी लक्ष्मी येई घरी,

शनिवारी मुंज मुलांना जेवण, रविवारी आदित्यांचे पूजन,

नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, भावाबहीणीच गठबंधन,

रोज गोडधोड … खीर, दींड, पुरणपोळी, नारळीभात, खांतोळी, पेढे,बर्फी, मेवामिठाई,

मसालेभात, कटाची आमटी, भजी, वडे डाव्या बाजूला,

 

पाठोपाठ गणराया आला … सुशोभन, रांगोळी 

गणेशाचे आगमन …. पूजा आरती,मंत्रपुष्पांजली … आली,आली मोदकांची थाळी,

 

अश्विनात विजयादशमी … लगेचच येणार दिवाळी,

आकाशकंदील, किल्ला… फराळाचा हल्लगुल्ला,

वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज,

पाहुण्यांची लगबग, तुळशीच लग्न, घरच्या लग्नांचे मुहूर्त, “शुभमंगल सावधान”,

 

मार्गशीर्षातल्या गुरुवारी श्रद्धेने पूजन, उपवास करिती महिला,

म्हणेतो,येतो नाताळ, तो साहेबाचा … परिणाम थोडा गुलामीचा,

 

असे संपतात बारा महिने, संकल्प राहतात अधुरे,

पुन्हा नववर्ष, नित्य,नवा हर्ष, उभारी, नवे संकल्प, उत्साहाचे वारे  

 

जीवनाचं हेच असे सार … 

इंग्रजी महिन्यातच जगतो, तरी मराठे महिने जगवूया,

ते पाठ‌ करण्याचा संकल्प करुया,

 

इतकीच छोटीशी इच्छा,

….. नववर्षाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा……

© सौ. सुनीता पाटणकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares