मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “गोष्ट एका आईची…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

परिचय 

शिक्षण : बीएससी बीएड.

वडील नकलाकार पत्की म्हणून सोलापूर जिल्ह्यात प्रसिद्ध त्यांच्याबरोबर वयाच्या पंचविसाव्या वर्षापर्यंत नकलांचे कार्यक्रम  सादर केले जे लोकरंजनातून लोकशिक्षण देणारे होते अनेक नाटकात काम.. नाट्यछटा लिखाण एकांकिका आणि पथनाट्याचे लेखन कविता आणि नृत्य गीतांचे लेखन.. कवितांना पारितोषिके आणि नृत्य गीताना हमखास पहिला नंबर.

शास्त्र उपकरणे तयार करण्याची आवड– जवळपास दीडशे उपकरणे मी तयार केली असून दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला एकदा लखनऊ येथे माननीय राष्ट्रपती झैलसिंग  यांच्या हस्ते व दुसऱ्यांदा जम्मू कश्मीर येथे माननीय राष्ट्रपती श्री व्यंकट रमण यांच्या हस्ते. नापास यांची शाळा हा माझा विशेष प्रकल्प मी गेले 32 वर्षे चालवत असून सुमारे 2000 विद्यार्थी दहावीपासून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम  केले आहे स्त्रीमुक्तीचे कार्य  केले आहे. महिलांसाठी अनेक उद्योगांची उभारणी. 38 वर्ष छंद वर्गाचे नियोजन सातत्याने केले आहे सुमारे 3000 विद्यार्थी याचा लाभ घेत असत.

साक्षरता अभियान यासाठी मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीने एक वर्ष डेप्युटेशनवर या प्रकल्पांतर्गत कार्यरत होते व त्यातून तीस हजार महिला आणि दहा हजार पुरुषांना साक्षर केले आहे. शैक्षणिक कार्य व महिलांची उन्नती यासाठी मी सतत कार्यरत राहिले आहे आजही वयाच्या 75 व्या वर्षी मी झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांना लिहायला वाचायला शिकवण्यापासून त्यांची उत्तम तयारी करून घेते आणि नवोपक्रम या सर फाउंडेशनच्या उपक्रमांतर्गत मी केलेल्या तीन वर्षाच्या कामावर प्रोजेक्ट सबमिट केला आणि त्यासाठी मला राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाला त्याचे वितरण जून मध्ये आहे आता अनेक विद्यार्थी शाळा संस्था यांना मदत मिळवून देण्याचे कार्य मी करीत आहे..

? मनमंजुषेतून ?

“गोष्ट एका आईची…सुश्री शीला पतकी 

साधारणपणे 2005 सालची गोष्ट होती. चौथीचे निकाल लागल्यावर आमच्याच प्राथमिक विभागाकडून ऍडमिशनसाठी पाचवीकडे दाखले पाठवले जातात.. हायस्कूल विभागाकडे. ते काम क्लार्कच्या मार्फत होत असतं. पण एका ऍडमिशनसाठी मात्र माझ्याकडे एक बाई आल्या आणि म्हणाल्या “ माझ्या मुलीचा प्रॉब्लेम आहे. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी तिला घरीच ठेवा असे सांगितले आहे किंवा बाईंचा सल्ला घ्या म्हणून मी तुमच्याकडे आले. ”   मी म्हणाले “ का बरं पाचवीत तिला घरी का बसवून ठेवायचं तिचे शिक्षण बंद करण्याचा आपल्याला काय अधिकार?”  त्यावर त्या म्हणाल्या, “  तिचे मेंदूच एक ऑपरेशन झाले आहे आणि त्यामध्ये एक छोटी ट्यूब आहे. तिला ट्यूमर झाला होता. तिला फारशी दगदग करायची नाही, खेळायचे नाही. तेव्हा मी आपल्याला विनंती करायला आलेय की तिच्याबरोबर मी शाळेत दिवसभर बसले तर चालेल का?”  आता पाचवीतल्या मुलीसाठी आईने दिवसभर शाळेत बसून राहायचं मला जरा गमतीदार वाटत होतं. मी म्हणाले, “ पण काय गरज काय त्याची…” … “  नाही हो तिला इतर मुली खेळायला लागल्या की खेळावे उड्या माराव्या वाटतात पळाव वाटतं… पण या सगळ्याला तिला बंदी 

आहे “ मी थोडी गप्पच झाले. “ दहा वर्षाच हसत खेळत उड्या मारणारे लेकरू त्यांनी गप्प बसून राहायचं.. खरंच अवघड होतं ते. ते तिने करता कामा नये म्हणून मला इथे थांबणे भाग आहे त्याशिवाय तिला अचानक काही त्रास झाला तर तुम्ही कुठे धावपळ करणार माझ्याकडे तिची औषधे असतात…!”

मी विचार केला आणि म्हणाले “ ठीक आहे तुम्ही वर्गाच्या बाहेर असलेल्या मैदानाच्या बाजूला बसू शकता…”  जून महिन्यात शाळा सुरू झाली  त्यानंतर त्या बाई येऊन वर्गाच्या बाहेर बसायला लागल्या आठ दहा दिवसांनी एक दोन शिक्षक आले आणि म्हणाले “ बाई त्या मुलीची आई त्या बाहेर बसतात आणि आम्हाला उगाचच डिस्टर्ब झाल्यासारखं होतं तिचा प्रॉब्लेम मोठा आहे उगाचच त्या मुलीची काळजी वाटते तिला काही झालं तर काय करायच…”  मी त्यांना म्हणाले, “  काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं जमतं का बघा.. ”  त्यांचं म्हणणं होतं की जोखीम आपण कशाला घ्यायची? मी म्हणलं “आपली मुलींची शाळा आहे मुलींच्या शिक्षणासाठी आपण प्रयत्न करतो आणि या मुलीला का आपण वंचित ठेवायचं आणि मला असं वाटतं की आपल्यापेक्षा जास्त काळजी इतर शाळेत कोणी घेणार नाही कारण आपण सगळ्या महिला आहोत मला एक मुलंबाळं नाहीत, पण तुम्ही तर आई आहात. तुम्ही त्याना खूप छान पद्धतीने समजून घेऊ शकाल.. विचार करा आपल्या पोटी असं पोर असतं तर आपण काय केलं असतं म्हणजे आपण आपल्या मुलाच्या बाबतीत जे केलं असतं तेच आपण त्यांच्यासाठी करू.. शाळेतनं कोणालाही काढणे शक्य नाही मला आपण त्या माऊलीला थोडी मदत करू!”  

या पद्धतीने शिक्षण सुरू झालं. मधे मधे त्या मुलीला त्रास व्हायचा तिची एक दोन ऑपरेशनस झाली मुलगी खूप गोड होती. आनंदी होती तिला आपल्या गंभीर दुखण्याची जाणीव नव्हती त्यामुळे आईला अधिक काळजी घ्यावी लागत होती साधारण सात साली मी रिटायर झाले आणि मग मी माझ्या कामाला लागले मुलगी तो पावतो सातवीत गेलेली होती पुढे मी काही फारशी चौकशी केली नव्हती पण आमचे सगळे शिक्षक खूप छान होते मदत करणारे मायाळू त्यामुळे पुन्हा काही त्यांना सांगावं असं मला मुळीच वाटलं मुख्याध्यापिका ही चांगल्या होत्या बरेच वर्षानंतर म्हणजे साधारणपणे दहावीचा निकाल लागल्यावर.. मी आमच्या नापास शाळेच्या संस्थेमार्फत नापास झालेल्या नववी आणि दहावीच्या मुलांना आणि पालकांना समुपदेशन करीत असे एक मीटिंग त्यासाठी फक्त लावलेली होती पालक आले प्रत्येकाचे प्रश्न जाणून घेतले त्याप्रमाणे त्यांना उपाय सांगितले आणि एका मुलीच्या आई नंतर थांबून राहिल्या त्या मला भेटल्या आणि त्या त्याच मुलीची आई होत्या त्या म्हणाल्या तुमच्यामुळे ती दहावीपर्यंत आली पण आता नापास झाली आहे आणि दोन विषय राहिले आहेत तुमच्याकडे काही सोय होईल का? मी म्हणलं माझ्याकडे ऑक्टोबरची व्यवस्था नाही पण माझ्या शिक्षकाकडे जर तुम्ही पाठवलं तर ते तिची तयारी करून घेतील त्या म्हणाला हरकत नाही मी पाठवते आता ती एकटी जाणे येणे करू शकते ठीक आहे त्यानंतर त्या म्हणाल्या बाई मला फार काळजी आहे या मुलीची आता सातत्याने मदत करणे तिला मला फार अवघड होत आहे या मुलीच्या दुखण्यामुळे पैसाही खूप खर्च करावा लागला त्यांनी दुसऱ्या अपत्याचा विचारही केला नाही असं बरच काही त्या मला सांगत होत्या त्या शेवटी म्हणाल्या खरं सांगू बाई मी जगातली एक वेगळी आई असेल किंवा एकमेवच अशी आई असेल की रोज संध्याकाळी देवाजवळ दिवा लावल्यानंतर आपल्या मुलीच्या मरणाची कामना देवापुढे करते मी रोज देवाला सांगते माझ्यासमोर हिला ने कारण आमच्या नंतर हिला इतकं समजून कोण घेणार आहे आता ती तरुण झालीये त्यामुळे जागोजागी मला सजग राहून तिची काळजी घ्यावी लागते तिच्या ट्यूमर मुळे काही वेळा थोडसं विस्मरण होतं अजून ते शंभर टक्के बरं झालेलं नाही मी त्याना म्हणाले असं करू नका देवाने प्रत्येकाला त्याचं त्याचे भाग्य दिले आहे तिचं जे नशीब असेल तेच होईल तुम्ही का काळजी करता त्यापेक्षा जमेल तेवढी काळजी घ्या मग मी आमच्या नापास शाळेतील दोन शिक्षकांवर तिचे जबाबदारी सोपवली मी त्या बाईंना सल्ला दिला खरा पण मी दिवसभर अस्वस्थ होते….. की एखादी आई आपल्या मुलीला परमेश्वरांन घेऊन जावे.. तिचे आयुष्य आपल्यासमोर संपावे यासाठी प्रार्थना करते आणि त्या पाठीमागेही आईचे प्रेम असावे.. यासारखे काय होतं दुसरं.. प्रेमाचा हा कोणता प्रकार ?.. हे असं सगळं फक्त आईच करू शकते  तिच्या हातातले सगळे उपाय संपतात आणि समाजातले वेगळेच प्रश्न तिला भेडसावायला लागतात तेंव्हा ती तरी यापेक्षा दुसरं काय करणार.. ? त्यानंतर ऑक्टोबर मध्ये ती पास झाली पुढे माझा संपर्क संपला नंतर 17 साली मी माझ्या संस्थेच्या माध्यमातून  एक पाककला स्पर्धा ठेवली होती त्यामध्ये जवळपास 40 एक महिलांनी भाग घेतला होता संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त स्पर्धा होती सर्व महिलांची नोंदणी क्लार्क करून घेत होती मी अन्य कामांमध्ये होते !सर्वांनी आपापली पाककृती सजवून मांडली.. शिक्षकांचे परीक्षण झालं.. सर्वांना दरम्यानच्या काळात अल्पोपहार आणि चहा देण्यात आला आणि हॉलमध्ये एकत्र करून मी आमच्या संस्थेबद्दल सर्वांना माहिती देत होते नापास शाळा.. महिलांसाठी करत असलेले कार्य इत्यादी माहिती मी देत होते  हे सगळं चालू असताना एक बाई उठून उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या मी बोलू का… ?. माझ्या एकदम लक्षात आलं की ह्या त्याच मुलीची आहेत.. त्यांनी माईक हातात घेतला आणि त्या बोलू लागल्या…. माझी मुलगी बाईंमुळे दहावी झाली आणि माझ्याकडे वळून पाहत म्हणाल्या तुम्ही कामात होता त्यामुळे तुम्ही मला पाहिले नाही आणि कदाचित ओळखले नसेल पण शीला पत्की मॅडमने माझ्या मुलीसाठी खूप केले आहे या संस्थेमार्फत दोन शिक्षकानी तिची तयारी करून घेतली आणि ती दहावी झाली आणि बाई मला हे सांगायला अतिशय आनंद होतो कि आज माझी मुलगी बीए झाली आहे आणि आज ती या तुमच्या स्पर्धेमध्ये सहभागी झाली आहे मग तिने सर्वांना आपल्या मुलीची कथा सांगितली तिची मुलगी उभी राहिली आणि पुढे आली.. खूप सुंदर दिसत होती मी तिला पंधरा वर्षाची पाहिलेले आता ती छान वयात आलेली… गोरी पान देखणी युवती झालेली होती सर्वात पुढचं वाक्य त्यांचे खूप छान होतं त्या म्हणाल्या बाई माझी मुलगी पूर्णपणे बरी झाली असून डॉक्टरांनी तिचा विवाह करायलाही परवानगी दिलेली आहे आता मेंदूचा म्हणून तिला कोणताही त्रास नाही तिचा ट्यूमर पूर्ण बरा झाला संपूर्ण सभागृहा ने टाळ्या वाजवल्या टाळ्यांच्या कडकडाटा त्या बाईंचा जणू आम्ही सत्कारच केला मी तर अचानक घडलेल्या प्रसंगाने भांबावून गेले होते डोळ्यातून पाणी वाहत होते.. मी भाषणाला उभी राहिली आणि एवढेच म्हणाले हेच आमच्या संस्थेचे कार्य आहे की एखाद्याला हात देऊन उभे करणे आणि मी सर्वांना हेही सांगितले देव कनवाळू आहेच पण तो कधीकधी आईचही ऐकत नाही ते खूप छान आहे या बाई रोज आपल्या मुलीसाठी देवाला प्रार्थना करीत होत्या की देवा माझ्या मुलीला माझ्या आधी घेऊन जा पण देवाने त्या प्रार्थनेतला अर्थ जाणून त्या मुलीला सक्षम करून सोडले मी जे चित्र पाहत होते त्याच्यावर माझाच विश्वास नव्हता…. !

माझ्या संस्थेचा वर्धापन दिन इतका फलदायी सुंदर साजरा होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं आजचा वर्धापन दिन काही वेगळाच होता खूप बळ देणारा आणि खूप प्रेरणा देणारा आणि माझी खात्री झाली की आईच्या प्रार्थनेत बळ असतं पण त्याहून अधिक तिच्या प्रेमात बळ असते हेच खरं…. !!!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तेरी मेरी कहानी…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

तेरी मेरी कहानी…☆ श्री मंगेश मधुकर 

‘एक प्यार का नग़मा है, मौजों की रवानी है

ज़िंदगी और कुछ भी नहीं, 

तेरी मेरी कहानी है’

—-  गीतकार संतोष आनंद यांनी जगण्याचा सारीपाट या गाण्यात फार सुंदर मांडलाय.

जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतो, तेव्हा तेव्हा ते खोलवर भिडतं. आजपण तसंच झालं. 

 

…. रविवारी अचानक रेडियोवर हे गाणं लागलं अन मन गुंग झालं.

जगण्याचा सहज सोपा अर्थ सांगणारी रचना ऐकून  एकेक गोष्टी नजरेसमोर आल्या. 

कसं असतं ना माणसाचं जगणं, वेगवेगळं आयुष्य असलं तरी प्रत्येकाच्या जगण्याचा घटनाक्रम हा सारखाच .. 

सुरुवात जन्मापासून,– त्यावेळी होणारे लाड,कौतुक,मिळणारं प्रेम, – पूर्ण परावलंबी असलं तरी  फार मस्त असतं ते आयुष्य. त्या निरागस वयात स्वार्थाशिवाय काहीच कळत नाही. तेच बरं असतं.

अर्थात सगळ्यांच्याच नशिबी हे नसतं हे देखील तितकंच खरयं.

 

सरत्या दिवसांसोबत वय वाढत जातं. हळूहळू विचार करायला शिकतो. आजूबाजूला चाललेलं समजायला लागतं. काय बरोबर,काय चूक ठरवता येतं. आणि मग!!

— मग निरागसतेची जागा व्यवहार घेतो. एकेक करून सगळंच बदलतं. 

लहानपणीचा बहारदार काळ ओसरून सुरू होतो अपेक्षांचा खेळ .. शाळेपासून चिकटलेल्या ‘अपेक्षा’ नंतर आयुष्यभर सोबत करतात. महत्वाकांक्षा, स्वप्न यांच्यामागे धावताना नोकरी,व्यवसाय,लग्न,संसार,मुलं एकेक जबाबदाऱ्या येतात. स्वरूप बदलतं पण ‘अपेक्षा’ साथ सोडत नाहीत. 

— हे मिळवायचं,ते मिळवायचं म्हणून चाललेला जीवाचा आटापिटा. कितीही मिळालं तरी कमी होत नाही.

दमतो,थकतो तरी पळणं थांबत नाही. टेन्शन नावाचा वेताळ पाठ सोडत नाही. तो नवनवीन प्रश्न निर्माण करतो  अन आपण उत्तरं देत राहतो. हा सिलसिला थांबत नाही. जगण्याची तऱ्हा निरंतर चालू राहते

स्वप्न,इच्छा प्रत्येकाच्या असतात. काहींच्या पूर्ण होतात तर काहींच्या …. 

चांगल्या-वाईट घटना घडत राहतात. सुख-दु:ख,ऊन सावली सारखं कूस बदलतात  

.. पराकोटीचा आनंदही मिळतो अन टोकाच्या वेदनासुद्धा. 

 

प्रतिकूल परिस्थितीनं निराशा दाटते. उदास वाटतं. वैताग येतो. संयमाचा कस लागतो. तरीही —

सगळं व्यवस्थित होईल, हा विश्वास जगण्यातली उमेद जिवंत ठेवतो. कितीही संकटं आली तरी हार मानली जात नाही. जगण्यातली हीच  गंमत आहे. 

 

नेहमी वाटतं की, आयुष्य म्हणजे चटकदार भेळ… कधी आंबट तर कधी गोड, कधी तिखट,झणझणीत डोळ्यातून पाणी काढणारी – – तरी भेळ आवडीनं खाल्ली जातेच.   

शंभर टक्के कोणीच सुखी नाही अन दु:खीही नाही, कितीही चढ उतार आले तरी जगण्यावरचं ‘प्रेम’ कमी होत नाही. 

– – जगणं म्हणजे – संतोष आनंद यांच्याच शब्दात सांगायचं तर — 

“आँखों में समंदर है, आशाओंका पानी है 

ज़िंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी हैं ”

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ परि तुझ्यावाचुनि करमेना… भाग – २ ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर ☆

सौ उज्ज्वला केळकर

??

☆ परि तुझ्यावाचुनि करमेना… भाग – २ ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर ☆

(त्यावेळी जरी मी घराबाहेर पडण्याची संधी एवढ्याच दृष्टीने बी.एड्. कडे पाहिलं असलं, तरी पुढच्या आयुष्यात मला त्याचा खूप फायदा झाला आणि ते करायला सुचवलं होतं माझ्या सहचराने.) – इथून पुढे 

मला पुढे १९७० साली, सांगलीला डी.एड्. कॉलेजमध्ये नोकरी लागली. त्यानंतर मी एम.ए. झाले. याच सुमाराला आम्ही आमचं स्वतंत्र छोटंसं घरकुल माधवनगरलाच मांडलं होतं. आमच्या लग्नाला दहा वर्षं झाली. आणि प्रकृतीने ‘अमोल’ ठेवा आमच्या पदरात टाकला. आता प्रश्न होता, नोकरी सोडायची की काय? पाळणाघर, किंवा मुलाला सांभाळायला बाई, ही मानसिकता घरात, समाजात तितकीशी रुजलेली नव्हती. प्रश्न होता, त्यावेळी नोकरी सोडली, तर चारसहा वर्षांनी, मुलाची सातत्याने देखभालीची गरज संपल्यावर, पुन्हा खात्रीपूर्वक नोकरी मिळेलच याचा काय भरवसा? माझ्या शेजारणीने माझ्या नोकरीच्या वेळात मुलाला सांभाळायचे कबूल केले, आणि माझ्या सासुबाईंनी आणि यांनी दोघांनीही मुलाकडे लक्ष देण्याची जबाबदारी स्वीकारली आणि माझी नोकरी अखंडितपणे चालू राहिली. नोकरीच्या वेळा बांधील असतात. धंद्याचं तसं नसतं. यांचा यंत्रमागावर कापड काढून देण्याचा व्यवसाय होता. तो माधवनगरातच होता. त्यामुळे गरजेप्रमाणे ते वेळ काढू शकत होते आणि तसा त्यांनी काढलाही. मुलाला वाढवताना आम्ही दोघांनी बरोबरीने जबाबदारी उचलली. यांनी कांकणभर जास्तच उचलली.

नोकरी, घरकाम, छोट्याचं संगोपन या सा-यात दिवस कधीच संपत असे. माधवनगरात तेव्हा पाण्याची खूप टंचाई होती. आजही आहेच. त्या वेळी चार-पाच दिवसातून एकदा पाणी यायचं. ते थोडंच असायचं. पिण्यापुरतं यायचं. बाकी वापराला विहिरीचं पाणी असे. पाणी ओढण्याचं काम यांनी स्वखुषीने स्वीकारलं होतं. बाजारहाटही ते करत. त्यामुळेच स्वयंपाक-पाणी, धुणं-बिणं सगळं उरकून मला नोकरीसाठी वेळेवर जाणं शक्य होत होतं. नोकरी म्हटली की तिथल्या जबाबदा-या, कर्तव्यं आलीच. अमोल दहा महिन्याचा असताना त्याला घरी ठेवून मला प्रशिक्षणासाठी दहा दिवस सातारला जावं लागलं होतं. पण यांनी सासूबाईंच्या मदतीने कोणताही गाजावाजा, गवगवा न करता मुलाला सांभाळलं. जाऊबाई, पुतणे-पुतण्या ही मंडळी पण होतीच!

मुलगा चार वर्षाचा झाला आणि आम्ही त्याच्या शिक्षणासाठी म्हणून सांगलीला बि-हाड केलं. तिथे त्याच्याबरोबर माझंही अनुभवक्षेत्र वाढत – विस्तारत गेलं. आवडी-निवडी जपायला, जोपासायला संधी मिळाली. कार्यक्रमातला सहभाग वाढला. श्रोता-प्रेक्षक म्हणून जाताना मुलाला बरोबर घेऊन जाणं, निदान पहिली काही वर्षं तरी अपरिहार्य होतं. जमेल तेवढं ऐकायचं. पाह्यचं. कविसंमेलन, व्याख्यानं, कथाकथन इ. मध्ये माझा प्रत्यक्ष सहभाग असे, तेव्हा मुलगा लहान असताना यांनी बघितलं. एक बरं होतं. या सा-या कार्यक्रमांत माझा सहभाग असावा, याबद्दल आमचं एकमत झालं. दुमत असतं तर… जाऊ दे. तो विचारच नको.

सांगलीला आल्यावर मला मिळणारा अवकाश वाढला असला तरी मला सुचतंय म्हणून आज बाकीची कामं बाजूला राहू देत. मी लिहीत बसते. एवढा आवाका मला कधीच लाभला नाही. घर, स्वयंपाक-पाणी, नोकरी-चाकरी संभाळून जमेल तसं आणि तेवढंच माझं लेखन झालं. मी वलयांकित लेखिका नव्हते, हेही त्यामागचं कारण असू शकेल. माझ्या घरकामात नाही, तरी मुलाच्या संगोपनात यांचं सहाय्य नक्कीच होतं.

आता घरकामात नाही असं म्हणतानाही बाजारहाट तेच करायचे हे मला कबूल करायलाच हवं. सगळ्यांत महत्त्वाचं काम म्हणजे सकाळी उठल्यावरचा पहिला चहा हेच करायचे आणि आल्या-गेल्यांना अगदी आवर्जून सांगायचे सुध्दा! मग मी म्हणायची, ‘सकाळी गाडीत एकदा पेट्रोल भरलं की गाडी दिवसभर न कुरकुरता चालू राहते…’

नोकरीच्या काळातही एक आठवण आवर्जून नोंदवाविशी वाटते. मिरज तालुक्यातील प्रौढ साक्षरांचं मूल्यमापन करण्यासाठी एक समिती नेमली होती. तिच्यात माझा समावेश होता. हे काम रात्री प्रौढ शिक्षण वर्ग सुरू झाल्यावर तालुक्याच्या वेगवेगळ्या गावी जाऊन करायचं असे. सुमारे महिना-दीडमहिना हे काम चाललं. मलाच कानकोंडं होई. पण या मुद्यावरून यांनी कधी खळखळ केली नाही.

आता हे सगळं वाचताना कुणालाही वाटेल तुम्ही तुमच्याबद्दल खूप लिहिलंत. त्यांच्याबद्दल काय? तर ते त्यांच्या आवडी-निवडीप्रमाणे, त्यांना हवं तसं जगत होतेच! हवं ते करत होते. पुरुष असल्यामुळे त्यांना त्यांचा अवकाश जन्मत: प्राप्त झाला होता. मलाही त्यांनी काही प्रमाणात तो प्राप्त करून दिला. ही आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट.

सांगली आकाशवाणीवरून ‘प्रतिबिंब’ ही श्रुतिकामाला सुमारे दहा-बारा वर्षं प्रसारित होत होती. त्यातील शंभर तरी श्रुतिका मी लिहिल्या असतील. श्रोत्यांनाही त्या पसंत पडत असल्याचं कळत होतं. ते संवाद, त्यातील वाद-विवाद आमच्या घरातल्या संवाद-विवादातून लिहिलेले असत. त्याला थोडी झिलई, चकचकीतपणा मी माझ्या लेखनातून दिलेला असे, एवढंच!

माझ्या लेखनाचा महत्त्वाचा स्त्रोत यांच्या वाणीतूनही अनेकदा उगम पावलेला आहे, तो असा! श्रुतिका ऐकल्यावर माझी एक मैत्रीण मुग्धा आपटे मला म्हणाली होती, ‘आमच्या घरात आम्ही जे बोलतो, ते तुला कसं कळतं?’ मी म्हटलं, ‘घरोघरी गॅसच्या शेगड्या… दुसरं काय?’

याचा अर्थ माझी वाटचाल अगदी मऊ मखमलीवरून झाली, असं मुळीच नाही. रेशमी काटे अनेकदा टोचले. अधून मधून बाभळीच्या काट्यांनीही रक्तबंबाळ केलं. भांड्याला भांडं अनेकदा लागलं. नुसता नाद नव्हे, खणखणाटही झाला.

लोकगीतातील ग्रामीण स्त्री आपल्या नवऱ्याच्या रागाला इंगळ्या इस्तुवाची उपमा द्यायची आणि आपण गोड बोलून चतुराईनं कसं ‘विसावण’ घालतो, याचं वर्णन करायची. मला असं विसावण घालणं कधी जमलं नाही. पण यांना जितक्या लवकर राग यायचा, तितक्याच लवकर तो निवायचाही. मग उगीचच काही तरी बोलून, हसवून ते वातावरणातला ताण दूर करतात. इच्छा नसतानाही मग मला फस्सकन हसू येतं. ‘तुझं नि माझं जमेना…’ असं अनेकदा म्हणता म्हणताच, ‘परि तुझ्यावाचूनि करमेना…’ याही सार्वकालिक सत्याचा प्रत्यय येतो.   

– समाप्त –

© सौ उज्ज्वला केळकर

संपर्क –17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ परि तुझ्यावाचुनि करमेना… भाग – १ ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर ☆

सौ उज्ज्वला केळकर

??

☆ परि तुझ्यावाचुनि करमेना… भाग – १ ☆ प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर ☆

माझी एक सख्खी मैत्रीण म्हणजे शुभदा साने. तशा आमच्या प्रत्यक्ष गाठीभेटी कमी होतात. पण आठवड्यातून एकदोनदा तरी फोन होतोच. दिलखुलास गप्पागोष्टी होतात. जून-जुलै च्या दरम्यान फोनमधून हमखास विचारणा असते, ‘कुठली कुठली बोलावणी आली…? काय काय झालं?’… बोलावणी म्हणजे दिवाळी अंकांची बोलावणी… साहित्य पाठवण्याविषयीचं पत्र आणि काय काय झालं, म्हणजे, काय काय लिहून झालं वगैरे… वगैरे… आम्हा मैत्रिणीत सगळ्यांत जास्त आणि सगळ्यात आधी बोलावणी तिला येतात. त्यामुळे हा काळ तिच्या दृष्टीने खुशीचा तसाच व्यस्ततेचाही असतो.

यंदा मात्र थोडंसं वेगळं घडलं. वेगळं म्हणजे काय? तर जूनअखेर अखेरच मला ‘मेहता ग्रंथजगत’ कडून पत्र आलं. फोनवर तसं तिला सांगितलं. ती म्हणाली, ‘हो का? कशावर लिहायचंय?’ मी म्हटलं, ‘माझा सहचर’… पत्र वाचल्यावर एकदम शाळेच्या दिवसांची आठवण झाली. म्हणजे शाळेत नाही का आपण निबंध लिहीत होतो? ‘माझी आई’, ‘माझी मैत्रीण, दादा, ताई, आजी-आजोबा इ.इ.’ माझं वाक्य पुरं होण्यापूर्वीच ती म्हणाली, ‘माझा मोत्या…’ आणि खिदळायला लागली. मग लगेच म्हणाली, ‘गंमत केली ग! पण त्याचा एक गुण आहेच तुझ्या मिस्टरांमध्ये…’ मी जरा विचारात पडले. म्हणजे माझ्यावरचं त्यांचं वसा वसा ओरडणं तिच्यापर्यंत पोचलं की काय? तशी मी सूज्ञपणे आणि संयमाने मैत्रिणीसमोर युध्दाचे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करत असते. तरी पण संगोवांगी तिच्यापर्यंत पोचलं की काय? पण ती गुण म्हणाली… की बदलत्या काळात अनेक बदलांप्रमाणे ‘गुण’ या शब्दाचाही अर्थ बदललाय? क्षणभरात एवढं सगळं माझ्या डोक्यात भिरभरून गेलं. एवढ्यात ती पुढे म्हणाली, ‘आज्ञाधारकपणा… तुमचे मिस्टर खूपच ऐकतात बाई तुमचं… आमच्याकडे नाही बाई असं…’ मला वाटतं, प्रत्येक नव-याला शेजा-याची बायको जास्त देखणी वाटते, तसं प्रत्येक बाईला दुसरीचा नवरा जास्त शहाणा, समंजस, समतोल विचारांचा, मुख्य म्हणजे तिच्या मुठीत रहाणारा वाटतो. निदान माझा सहचर असा आहे, याबद्दल माझ्या सगळ्या मैत्रिणींची शंभर टक्के खात्री आहे आणि तसं काही नसलं, तरी तसंच आहे, हे इतरांना पटवून देणं माझ्या सहचराला छानच जमतं. म्हणजे, तुलना केलीच तर सृजनाची प्रतिभा माझ्यापेक्षा त्याच्याकडे जास्त आहे. आता ते फक्त लिखाणातून नाही, तर बोलण्यातून, वाणीतून जास्त प्रसवतं एवढंच!

त्यानंतर एकदा आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र जमलो होतो. साहित्यकलेपासून राजकारण… क्रीडेपर्यंत सगळ्या विषयांना पालाण घालून झाल्यावर गप्पांना खरा रंग भरला, तो आमच्या यांना.. आमच्या घरात… आमची मुलं… असं नि तसं सुरू झाल्यावर, आता माझ्या सगळ्याच मैत्रिणींना वाटतं, आमचे हे म्हणजे सद्गुणांचा पुतळा… मग मी म्हणून टाकलं,

‘आमच्या सुखी आणि समृध्द सहजीवनाचं मधुर पक्व फळ

चाखत माखत खातोय आम्ही गेली कित्येक वर्षं….’

‘याचं रहस्य?’ एकीने लगेच टोकलं. म्हटलं,

‘रहस्य कसलं त्यात? आमच्या घरात नेहमीच घडतं माझ्या इच्छेप्रमाणे…’

‘तेच तर आम्ही म्हणतो…’

सगळ्यांनी एकदमच गिल्ला केला.

‘थांबा… थांबा… पुरतं ऐकून घ्या…’

मी त्यांना थांबवत म्हणते.

‘आमच्या घरात नेहमीच घडतं  माझ्या इच्छेप्रमाणे

जेव्हा एकमत असेल तेव्हा

आणि घडतं त्यांच्या इच्छेप्रमाणे

दुमत असेल तेव्हा…’

क्षणभर त्या गोंधळल्याच. ‘बंडल मारू नका’ त्या एकदमच म्हणाल्या. ‘शप्पथ!’ मी म्हटलं. हे हे आत्ता म्हटलं ना, ते सुध्दा त्यांचंच म्हणणं आहे. मी आपली कवितेच्या फॉर्ममध्ये त्याची मांडणी केली, एवढंच!

विद्येचे माहेरघर असलेल्या आणि साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचं केंद्रबिंदू असलेल्या पुण्यनगरीतून १९६५ साली, लग्न होऊन मी माधवनगरला आले. गाव सांगलीपासून तीन-चार मैलावर, पण वहातूक व्यवस्था फारशी नव्हती. अधूनमधून येणा-या महामंडळाच्या बसेस किंवा मग टांगे. टू व्हिलर म्हणजे सायकलीच प्रामुख्याने. घराघरात स्कूटर्स दिसायचा काळ अद्याप खूपच दूर होता. त्यामुळे सांगलीला होत असलेल्या कार्यक्रमांचा मला फारसा उपयोग नसे.

घर मोठं होतं. बारा पंधरा माणसं नित्याचीच. येणं जाणंही खूप असे. घरात माणसांचा तसाच कामाचाही खूपच धबडगा असे. गृहस्थाश्रमाच्या रहाटगाडग्यात उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त काम आणि कामच असे. मन-बुध्दीला, विचार, कल्पनाशक्तीला तसा विश्रामच असे. माय स्पेस किंवा माझा अवकाश याबद्दल आज जे सातत्यानं बोललं जातं, तो मला त्यावेळी बिंदूतसुध्दा मिळत नव्हता. नाही म्हणायला, गावात ब-यापैकी असलेले वाचनालय आणि महिला मंडळ हे हिरवळीचे तुकडे होते. ‘वंदना’ हे वार्षिक हस्तलिखित मंडळातर्फे निघत असे. त्याचं संपादन, महिला मंडळासाठी बसवायचे कार्यक्रम यातून थोडीफार कल्पनाशक्तीला चालना मिळायची.

मला आठवतंय, मी माझी पहिली कथा ‘वंदना’ हस्तलिखितासाठी लिहिली होती. पण ते सारं कधीमधी. रोजच्या जीवनात माझ्या शिक्षणाशी संबंधित असं काहीच नव्हतं. यामुळे होणारी माझी घुसमट यांच्या लक्षात आली. (आमचा काळ हा, हे अहो… जाहोचा! इकडून तिकडून पुढे एक पाऊल पडलेलं. सर्रास ‘अरे तुरे… चा काळ यायला अजून वीस-पंचवीस तरी वर्षं लागणार होती.) लग्नानंतर दुस-या वर्षी मला बी.एड्. ला जाणार का? म्हणून विचारलं. त्या वेळी शिक्षकी पेशाविषयी आस्था वा आकर्षण म्हणून नव्हे, तर स्वयंपाकघर-माजघर, उंबरठा-अंगण या परिघाबाहेर पाऊल टाकायची संधी मिळणार, म्हणून मी ‘होय’ म्हणून टाकलं. सकाळी कॉलेज, दुपारी पाठ, एवढं सोडून जागं असलेल्या वेळात घरकाम, त्यामुळे खूप फरफट झाली. पण मजाही खूप वाटली. शारीरिक ओढाताण झाली, तरी मन प्रसन्न, टवटवित राहिलं. कॉलेजमधील विविध कार्यक्रम, पाठाची तयारी यात कल्पकतेला खूप वाव मिळायचा. त्यावेळी जरी मी घराबाहेर पडण्याची संधी एवढ्याच दृष्टीने बी.एड्. कडे पाहिलं असलं, तरी पुढच्या आयुष्यात मला त्याचा खूप फायदा झाला आणि ते करायला सुचवलं होतं माझ्या सहचराने.

– क्रमशः भाग पहिला 

© सौ उज्ज्वला केळकर

संपर्क –17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझे आजोळ… भाग – २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझे आजोळ… भाग – २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(पण आज जेव्हा मी विचार करते तेव्हा ‘आपण काहीतरी चुकीचे केले’ याची मला खूप रुखरुख वाटते.आपण आजोबांपासून हे लपवायला नको होतं.) – इथून पुढे —

इतके सगळे जरी असले ना तरी भाई आमचे  खूप लाड करायचे. शनिवारी— रविवारी दुपारी ते आमच्याबरोबर पत्ते खेळायचे.  ‘झब्बु’ नावाचा खेळ आम्ही खेळायचो.  त्यावेळी  भाई आम्हाला खूप विनोदी किस्से सांगायचे.  आम्हाला चिडवायचे, आमच्याबरोबर मोठमोठ्याने हसायचे.  संध्याकाळी आम्हाला चौपाटीवर फिरायला  घेऊन जायचे. बिर्ला क्रीडा केंद्रापासून थेट नरिमन पॉईंट पर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर पायी चालत जायचो.  त्या वेळच्या मुंबईच्या समुद्राचे सौंदर्य काय वर्णू? त्या फेसाळत्या  लाटा, तो थंडगार वारा, समोर  धनवानांच्या सुंदर इमारती, रोषणाई असलेली दुकाने आणि अतिशय वेगात चालणारी दिमाखदार वाहनं. आजोबां बरोबरचा हा समुद्रावरचा पायी फिरण्याचा अनुभव अविस्मरणीय असायचा.  या पायी फिरण्याचा काळातही भाई आम्हाला अनेक गोष्टी सांगायचे. वेळेचे महत्व, बचतीचे महत्त्व, शिस्त स्वच्छता यांचं महत्त्व वगैरे अनेक विषयावर ते बोलायचे. त्यांची मुख्य तीन तत्त्वे होती. पहिलं तत्व डी टी ए. म्हणजे डोंट ट्रस्ट एनीबडी.

दुसरं— टाईम इज मनी.

आणि तिसरं— इफ यू सेव्ह पेनी पाऊंड विल सेव्ह यु.

समुद्रावरून फिरून आल्यानंतर आम्हाला ते कधी जयहिंदचा आईस्क्रीम नाहीतर शेट्टीची भेळपुरी खायला न्यायचे. आम्ही साऱ्या नातवंडांनी सुट्टीत त्यांच्याबरोबर काश्मीर ते कन्याकुमारी असा भरपूर प्रवास केलाय. अनेक नाटकं, चित्रपट आम्ही सुट्टीमध्ये भाईंबरोबर पाहायचो. रात्री रेडिओ जवळ बसून एकत्र, आकाशवाणीवरून सादर होणारी नाटके, श्रुतिका ऐकायचो. फक्त एकच होतं या सगळ्या गंमतीच होत्या. तरीही यात भाईंची शिस्त आणि त्यांच्या आराखड्याप्रमाणे घडायला हवं असायचं. माझ्या बंडखोर मनाला ते जरा खटकायचं. मला वेगळंच आईस्क्रीम हवं असायचं. भाईंनी भेळपुरी मागवलेली असायची तर मला शेवपुरी खायची असायची. आता या आठवणी गंमतीच्या वाटतात.

मी कधी कधी आजोळी आले असताना पाठीमागच्या आवारात आऊट हाऊस मध्ये राहणाऱ्या नंदा नावाच्या मुलीशी खेळायला जायची.  तिचं घर अंधारलेलं कोंदट होतं. घराच्या पुढच्या भागात तिच्या वडिलांचं पानबिडीचं दुकान होतं. विड्या त्यांच्या घरातच वळल्या  जात. त्यामुळे तिच्या घरात एक तंबाखूचा उग्र वास असायचा. पण तरीही मला तिच्याकडे खूप आवडायचं. तिथे मी आणि नंदा मुक्तपणे खेळायचो. कधीकधी तर मी तिच्याकडे जेवायची सुद्धा. आम्ही दोघी गवालिया टॅंक वर फिरायला जायचो. मी परवानगीशिवाय जायची. नंदाला मात्र परवानगीची गरज वाटायची नाही. तिच्या घरात कसं मुक्त वाटायचं मला आणि हो तिच्याबरोबर मी, ती मडक्यातल्या पाण्यात बुडवून दिलेली चटकदार पाणीपुरीही  खायची. माझ्यासाठी मात्र हा सारा चोरीचा मामला असायचा पण माझ्या आजोळच्या वास्तव्यातला तो माझा खरा आनंदही असायचा. तिथेच दुसऱ्या आऊट हाऊस मध्ये  गुरखा राहायचा. त्याची घुंगट घातलेली बायको मला फार आवडायची. ती, माझे आणि नंदाचे खूप लाड करायची. तिच्या हातचे पराठे आणि लिंबाचं लोणचं! आठवून आताही माझ्या तोंडाला पाणी सुटतं.

पाठीमागच्या आवारात अनेक कामं चालायची. पापड वाळवणे, उखळीत लाल मिरच्यांचे तिखट कुटणे, धान्य वाळवणे,  निवडणे वगैरे. ही सारी कामं   सदनिकेतल्या लोकांचीच असायची पण ती करून देणारी    आदिवासी माणसं  असायची आणि त्यातही बायाच  असायच्या. त्यांचं  वागणं,  बोलणं,काम करताना गाणं,  त्यांनी घातलेले दागिने, कपडे यांचं  मला फार अप्रूप वाटायचं. माझी त्यांच्याशी मैत्री व्हायची.अद्ययावत संस्कृतीतून बाहेर येऊन या लोकांच्यात मी  रमायची.माझी भावंडं मला चिडवायची.पण माझ्यावर त्याचा काहीच परिणाम व्हायचा नाही.

निकालाच्या दोन दिवस आधी आम्ही भाईंना निरोप देऊन ठाण्याला परतायचचो.  तेव्हा कळत नव्हतं आईच्या डोळ्यातल्या अश्रूंचं नातं. भाईही पाणावायचे. एवढा पहाडासारखा माणूस हळवा व्हायचा. अजूनही सांगते, तेव्हा माझ्या मनात फक्त ठाण्याला, आपल्या घरी परतण्याच्या विचाराचा आनंद मनात असायचा. या वाहणाऱ्या पाण्याचा अर्थ तेव्हा नाही कळायचा पण आता कळतो. आता त्या आठवणीनेही  माझे डोळे गळू लागतात. लहानपण आणि मोठेपण यात हेच अंतर असतं.

ठाण्याच्या घरी आजी उंबरठ्यावर वाट पाहत असायची, तिने आमच्यासाठी माळ्यावर आंब्याच्या अढ्या पसरवलेल्या असायच्या. मी घरात शिरल्याबरोबर आजीला मिठी मारायची आणि म्हणायची,

“जीजी मला तुझ्या हातचा आक्खा आंबा खायचा आहे.”

‘आक्खा आंबा’ ही  कल्पना खूप मजेदार आहे बरं का?

भाईंकडे असतानाही आम्ही खूप आंबे खाल्लेले असायचेच. पण खूप आणि मनमुराद  यात फरक आहे ना? तिथे आंबे व्यवस्थित कापून एकेकाला वाटले जायचे.   म्हणून हे आक्खा आंबा खाण्याचे सुख काय होतं हे कसं सांगू तुम्हाला?

आणखी एक —घरी आल्यावर जाणवायचं! 

”अरे! इथे तर कायम आजी आपल्या सोबतच असते.” म्हणजे खरंतर आपलं हेच कायमचं आजोळ नाही का? पण एका आजोळा कडून दुसऱ्या भिन्न आजोळाकडे जाणाऱ्या प्रवासात मी जीवनातले विविध धडे शिकले. एक आजोळ मायेचं, उबदार. दुसरं शिस्तीचं, नियमांचं. या दोन भिन्न प्रकृतींनी माझं जीवन नेटकेपणानेच घडवलं.  त्या आजोळाकडचे भाई खूप उशिरा कळले, उशिरा जाणवले.

आज पोस्टाच्या पाकिटावर व्यवस्थित पत्ता  लिहितानाही भाईंची आठवण येते. कपड्यांच्या घड्या घालताना भाईंची शिकवण आठवते. मी माणसांना चाचपडत असते तेव्हा आठवतं, भाई म्हणायचे,” कुणाला घरात घेण्याच्या आधी त्याची परीक्षा घ्या. संपूर्ण विश्वास कुणावरही ठेवू नका.”

“वस्तूंच्या जागा बदलू नका” ही त्या आजोळची  शिकवण आयुष्यभर निरनिराळ्या  अर्थाने उपयोगी पडली. किती आणि काय काय लिहू? थांबते आता.

पण माझ्या आजोळी ज्यांनी माझी झोळी कधीच फाटू दिली नाही त्या सर्वांच्या स्मृतींना कृतज्ञतापूर्वक प्रणाम !

– समाप्त –

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ माझे आजोळ… भाग – १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझे आजोळ… भाग – १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

का. रा. केदारी.

ईश्वरदास मॅन्शन, बी ब्लॉक, पहिला मजला, नाना चौक, ग्रँट रोड, मुंबई.

हे माझे आजोळ.

वास्तविक आजोळ हा शब्द उच्चारला की नजरेसमोर येतं एक लहानसं, टुमदार  गाव.  झुळझुळणारी नदी, दूरवर पसरलेले डोंगर,  हिरवे माळरान,  कौलारू,  चौसोपी,  ओसरी असलेलं घर. ओटीवरचा पितळी कड्यांचा,  शिसवी पाटाचा झोपाळा, अंगणातलं पार असलेलं बकुळीचं किंवा छान सावली देणार झाड.  सुट्टीत आजोळी जमलेली सारी नातवंडं.  प्रचंड दंगामस्ती,  सूर पारंब्यासारखे खेळ आणि स्वयंपाक घरात शिजणारा  सुगंधी पारंपारिक स्वयंपाक.

हो की नाही?

पण माझे आजोळ असे नव्हते. ते मुंबई सारख्या महानगरीत, धनवान लोकांच्या वस्तीत, अद्ययावत पारसी पद्धतीच्या सदनिका असलेल्या देखण्या प्रशस्त सहा मजली इमारतीत होतं.  गुळगुळीत डांबरी रस्त्यांवर बसेस, काळ्या—पिवळ्या टॅक्स्या, ट्राम्स अविरत धावत असत. अंगण नव्हतं. सदनिकेच्या मागच्या बाजूला फरशी लावलेली मोकळी जागा होती.  तिथेच काही आऊट हाऊसेस, आणि सदनिकेत राहणाऱ्या धनवान लोकांच्या गाड्या ठेवण्यासाठी गॅरेजेस होती. 

त्या मोकळ्या जागेत ईश्वरदास मॅन्शन मधली मुलं मात्र थप्पा, आंधळी कोशिंबीर,डबा ऐसपैस, लगोरी,  लंगडी, खो खो असे दमदार खेळ खेळत. यात काही मराठी मुलं होती पण बरीचशी मारवाडी आणि गुजराथी होती. ही सारी मुलं मुंबईसारख्या महानगरीत शहरी वातावरणात वाढत होती.  विचार करा. त्यावेळी ही मुलं सेंट  कोलंबस अथवा डॉन बॉस्को सारख्या इंग्रजी माध्यम असलेल्या नामांकित शाळेत शिकत होती. फाडफाड इंग्लिशमध्ये  बोलायचे सारे.

मी ठाण्याची. माझा घरचा  पत्ता – धोबी आळी, शा.मा. रोड, टेंभी नाका ठाणे.

पत्त्यावरूनच कुटुंब ओळखावे. साधे, बाळबोध पण साहित्यिक वातावरणात वाढत असलेली, नगरपालिकेच्या बारा नंबर शाळेत,  मराठी माध्यमातून शिक्षण घेत असलेली मी.  सुट्टीत आईबरोबर आईच्या वडिलांकडे म्हणजे आजोबांकडे त्यांच्या पाश्चिमात्य थाटाच्या घरी जायला आम्ही उत्सुक असायचो.

माझ्या आजोळीच्या आठवणी वयाच्या पाच सहा वर्षापासूनच्या अजून पक्क्या आहेत. आजोळ  म्हणजे आजी आजोबांचं घर. आजीचा सहवास फार लाभला नाही. तरीही कपाळी ठसठशीत कुंकू लावणारी, कानात हिऱ्याच्या कुड्या आणि गळ्यात हिऱ्याचं मंगळसूत्र मिरवणारी,  इंदुरी काठ पदराची साडी नेसणारी,प्रसन्नमुखी  मम्मी अंधुक आठवते. ती मला “बाबुराव” म्हणायची तेही आठवतं. पण ती लवकर गेली.

वयाच्या पस्तीस—चाळीस  वर्षांपर्यंत म्हणजे आजोबा असेपर्यंत मी आजोळी जात होते.  खूप आठवणी आहेत.  माझ्या आठवणीतलं आजोळ, खरं सांगू का? दोन भागात विभागलेलं  आहे. बाळपणीचं आजोळ आणि नंतर मोठी झाल्यावरचं, जाणतेपणातलं आजोळ.

वार्षिक परीक्षा संपली की निकाल लागेपर्यंत आई आम्हाला आजोबांकडे घेऊन जायची. मी, माझ्या बहिणी आणि आई.  वडील आम्हाला व्हिक्टोरिया टर्मिनसला सोडायचे. आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानक. तेव्हा व्हीटी म्हणून प्रसिद्ध होतं. ठाणा स्टेशन ते व्हीटी हा प्रवासही मजेदार असायचा. व्हीटीला उतरलं  की सारा भव्यपणा सुरू व्हायचा. समोर महानगरपालिकेची इमारत.  तिथे आम्हाला घ्यायला आलेली आजोबांची मरून कलरची, रुबाबदार रोव्हर गाडी उभी असायची  पण त्यापूर्वीचा, व्हीटीला उतरल्यावर पप्पांच्या आग्रहास्तव प्राशन केलेल्या थंडगार निरेचा अनुभवही  फारच आनंददायी असायचा. 

आजोबांकडे मावशी आणि माझी मावस भावंडंही आलेली असायची, रंजन, अशोक,  अतुल आणि संध्या.  संध्या मात्र जन्मल्यापासून आजी-आजोबांजवळच राहायची.  सेंट कोलंबस मधली विद्यार्थिनी म्हणून तिच्याबद्दल मला खूपच आकर्षण होतं.  आम्ही सुट्टीत तिथे गेलो की तिलाही खूप आनंद व्हायचा. महिनाभर एकत्र राहायचं, खेळायचं, उंडरायचं, खायचं,  मज्जा करायची. धम्माल! 

धमाल तर होतीच.  पण?  हा पण जरा मोठा होता बरं का. माझे आजोबा गोरेपान, उंचताड, सडसडीत बांध्याचे. अतिशय शिस्तप्रिय. बँक ऑफ इंडियात  ते मोठ्या हुद्द्यावर होते. त्यावेळी बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले नव्हते. ब्रिटिशकालीन शिस्तीत त्यावेळी कार्यालयीन कामं चालत. आणि त्या संस्कृतीत माझ्या आजोबांची कर्मचारी म्हणून जडणघडण झाली होती. त्यांची राहणी, आचार विचार सारेच पाश्चिमात्य पद्धतीचे  होते. त्यावेळी आजोबांकडे वेस्टर्न टॉयलेट्स, बॉम्बे पाईप गॅस, टेलिफोन, फ्रिज वगैरे होते. घर म्हणाल तर अत्यंत टापटीप,  स्वच्छ.  फर्निचरवर धुळीचा कण दिसणार नाही.  दिवाणखान्यात सुंदर काश्मिरी गालिचा अंथरलेला,  वॉशबेसीनवरचा  पांढरा स्वच्छ नॅपकिन टोकाला टोक जुळवून टांगलेला. निरनिराळ्या खोलीत असलेल्या काचेच्या कपाटात  सुरेख रचून ठेवलेल्या जगभरातल्या अनेक वस्तू. खिडक्यादारांना सुंदर पडदे,शयनगृहात गादीवर अंथरलेल्या विनासुरकुतीच्या स्वच्छ चादरी आणि असं बरंच काही. असं माझं आजोळ  सुंदरच होतं.

आता आठवत नाही पण आम्ही इतके सगळे जमल्यावरही आजोबांचं घर विस्कटायचं नाही का?

आम्ही कुणीच नसताना आणि आजी गेल्यानंतर त्या घरात आजोबा आणि त्यांची  निराधार बहीण म्हणजे आईची आत्या असे दोघेच राहायचे.. आत्याही तशीच शिस्तकठोर आणि टापटीपीची पण अतिशय चविष्ट स्वयंपाक करायची. आम्ही सारी भावंडं जमलो की तिलाही आनंद व्हायचा. सखाराम नावाचा एक रामागडी होता. दिवसभर तो आजोबा— आत्या साठी त्यांच्या शिस्तीत राबायचा. आमच्या येण्याने  त्यालाही खूप आनंद व्हायचा. तो आम्हा बहिणींसाठी गुलाबाची आणि चाफ्याची फुले आणायचा. 

आजोबा सकाळी दहा वाजता बँकेत जायचे. रामजी नावाचा ड्रायव्हर होता तो त्यांची बॅग घ्यायला वर यायचा. आजोबा संध्याकाळी सात वाजता समुद्रावर फेरफटका मारून  घरी परतायचे. म्हणजे दहा ते सात हा संपूर्ण वेळ आम्हा मुलांचा.  पत्ते, कॅरम! सागर गोटे आणि असे अनेक खेळ आम्ही खेळायचो. एकमेकांशी भांडणं, मारामाऱ्या एकी-बेकी सगळं असायचं.  आत्या रागवायची पण आजोबांना..ज्यांना आम्ही  भाई म्हणायचो, त्यांना जितके आम्ही घाबरायचो तितके तिला नव्हतो घाबरत. सात वाजेपर्यंत  विस्कटलेलं घर आम्ही अगदी युद्ध पातळीवर पुन्हा तसंच नीटनेटकं करून ठेवायचो.

एकदा एका  सुट्टीत मला आठवतंय, भाईंची शिवण्याची सुई माझ्या हातून तुटली.  तुम्हाला खोटं वाटेल पण तीस वर्षं भाई ती सुई वापरत होते. पेन्सिल, सुई यासारख्या किरकोळ वस्तू सुद्धा त्यांना इकडच्या तिकडे झालेल्या, हरवलेल्या,  मोडलेल्या चालत नसत. या पार्श्वभूमीवर सुई तुटण्याची ही बाब फार गंभीर होती.  पण रंजनने खाली वाण्याकडे जाऊन एक तशीच सुई आणली आणि त्याच जागी ठेवून दिली. सात वाजता भाईंची दारावर बेल वाजली आणि माझ्याच काय सगळ्या भावंडांच्या छातीत धडधड सुरू झाली. जो तो एकेका कोपऱ्यात जाऊन वाचन नाही तर काही करण्याचं नाटक करत होता. सुदैवाने भाईंच्या लक्षात न आल्यामुळे ते सुई प्रकरण तसंच मिटलं. पण आज जेव्हा मी विचार करते तेव्हा ‘आपण काहीतरी चुकीचे केले’ याची मला खूप रुखरुख वाटते.आपण आजोबांपासून हे लपवायला नको होतं.

 – क्रमशः भाग पहिला 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सज्जनगडावरील प्रसादाची खीर!…” – लेखक : डॉ. वीरेंद्र ताटके ☆ श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

??

☆ “सज्जनगडावरील प्रसादाची खीर!” – लेखक : डॉ. वीरेंद्र ताटके ☆ श्री मोहन निमोणकर

सज्जनगडावर भोजनप्रसादात मिळणारी गव्हाची खीर हा पीएचडीचा विषय होऊ शकतो. गेल्या शेकडो वर्षात गडावरील रामदासी लोक बदलले, त्यांची खीर करायची पद्धत देखील इतक्या वर्षांमधये   बदलली असेल पण खिरीची चव मात्र जैसे तैशीच ! 

लहानपणी गडावर जाण्याचे मुख्य आकर्षण असायचे ते या खिरीचे….. आणि आता वयाने मोठं झाल्यावर…. खोटं कशाला बोलायचं…. आजही त्या खिरीचे आकर्षण तेवढेच आहे. काहीजण या खिरीला लापशी म्हणतात परंतु ‘खीर’ या शब्दात जो जिव्हाळा आहे तो ‘लापशी’ या शब्दात नाही.

भोजनप्रसादात या खिरीचे आगमन होण्यासाठी मोठी वाट पाहावी लागते. आधी प्रसादाच्या रांगेत उभे राहून आतून येणाऱ्या  सुगंधावरून आज पानात  भातासोबत फक्त  आमटी आहे की एखादी भाजी सुद्धा आहे याचा अंदाज लावायचा… त्यानंतर थोड्या वेळाने ताटं-वाट्यांचा आवाज येतो.  नंतर भोजनगृहात प्रवेश मिळाला की नामस्मरण झालं की सर्वप्रथम भात -आमटी मीठ, चटणी यांचे पानात आगमन होतं….. आणि मग  खरपूस सुगंधाचा सांगावा आधी पाठवत त्यानंतर त्या बहुचर्चित खिरीच्या बादल्यांचे आगमन होते….. पण सांभाळून…. डेक्कन एक्सप्रेसच्या वेगाने तुमच्याकडे येणारी खीर तुमच्या पानापर्यंत पोहचण्याआधी भात आमटी संपवून ताट चकचकीत करायचं कसब तुमच्याकडे हवं.  भोजन-प्रसादाला नियमित येणाऱ्या बंधू-भगिनींना हे अंगवळणी पडलेलं असतं.

अर्थात हा भोजनप्रसाद घेणारा मनुष्य सुद्धा चांगला बलदंड असला पाहिजे. उगाच ‘नको-नको ‘ म्हणणारा ( आदरणीय मकरंद बुवांच्या शब्दात -‘कायमचूर्णवाला’ ) नको. त्यासाठी  पंगतीच्या त्या टोकाला खिरीने गच्च भरलेली बादली घेतलेले काका  दिसले की त्यांच्या वाढण्याच्या वेगाचा अंदाज घेऊन ते आपल्यापर्यंत पोहचण्याआधी आपल्या पानातील खीर संपविण्याचा वेग पाहिजे. टाईमपास करत – गप्पा मारत प्रसाद घेणाऱ्याचे हे कामच नाही.

काही गृहिणी म्हणतात की आम्ही आमच्या घरी सुद्धा अशी खीर करतो पण  तुम्ही  गडावर मिळते तशी  खीर  घरी करून दाखवली तर मी कसलीही पैज हरायला तयार आहे. मुळात रेसिपीची पुस्तके वाचून – “अमुक एवढा गुळ, अमुक एवढे पाणी, तमुक मुठी गहू, मंद आचेवर  इतका  वेळ  ठेवावी ” असली वाक्ये वाचून करण्याचा हा पदार्थच नाही.

गडावर मिळणारी खीर ही ‘रेसिपी’ नसते तर ‘प्रसाद’ असतो. त्यात भिक्षाफेरीत रामदासी मंडळींनी दारोदारी अनवाणी जाऊन, मनाच्या श्लोकांचा जागर करत गोळा केलेला आणि  असंख्य भक्तांनी प्रेमाने दिलेला  शिधा असतो, गडाच्या पायथ्यापासून घाम गाळत गव्हाची पोती गडावर पोहचविणाऱ्या सेवेकऱ्यांचे श्रम असतात, जमा झालेले गहू निवडून-पाखडून, त्याला ऊन  दाखवून वर्षभर जपून ठेवणाऱ्या माता-भगिनींचे कष्ट असतात.

या सर्वांसोबत मला सर्वाधिक आश्चर्य वाटतं ते भोजनप्रसादाची खीर  तयार करणाऱ्या बल्लवाचार्य मंडळींचे !  प्रसादाला नक्की किती लोक आहेत हे पहिली पंगत बसेपर्यंत सांगता येत नाही. तरीही आलेल्या सर्वांना पुरेल एवढी आणि नेमकी त्याच चवीची खीर रोज तयार करायची. या सेवकांच्या या  ‘स्कील’पुढे  तर नतमस्तकच व्हावेसे वाटते. (आपल्या घरी एखादा पाहूणा अचानक आला तर जेवणासाठी आपली किती तारांबळ उडते याची आपल्याला सर्वांना कल्पना आहे).

आदर्श दिवसाची कल्पना काय असं विचारलं तर मी उत्तर देईन, ” सकाळी प्रसादापूर्वी गडावर पोहचावे.  रामराया, मारुतीराय, समर्थ, परमपूज्य श्रीधर स्वामी  यांचे दर्शन घेऊन प्रसादाच्या रांगेत वेळेत उभे राहावे, भोजनप्रसादात खिरीची बादली आपल्यापुढे तीन-चार वेळा यावी आणि त्यावेळी आपले पान चकचकीत असावे, भोजनप्रसादानंतर थोडा वेळ कलंडून दुपारचा चहा घेऊन धाब्याच्या मारुतीचे दर्शन घेऊन यावे. सायंउपासनेला, दासबोध-वाचनाला हजर रहावे. शेजारती झाल्यानंतर रात्रीच्या पंगतीला पिठलं-भातासोबत  पुन्हा एकदा सकाळची मुरलेली खीर असावी  आणि त्यानंतर मुक्कामाला खोली मिळालेली असावी…… सगळं जग विसरून जाण्यासाठी यापेक्षा अधिक काय हवं ?

लेखक :  डॉ वीरेंद्र ताटके 

पुणे, ९२२५५११६७४ 

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हरीणकाळजातील हळवी भीती! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

??

हरीणकाळजातील हळवी भीती! ☆ श्री संभाजी बबन गायके 

गीतकार आनंद बख्शी

किसी राहमें किसी मोड पर…कहीं चल न देना तू छोडकर ! .. मेरे हमसफर…मेरे हमसफर !

सृष्टी अव्याहतपणे सृजनाची,नवनिर्माणाची,चैतन्याची वाट चालावी म्हणून स्त्री-पुरुषांमधील नातेसंबंधांना नियतीने एकमेकांच्या हातात हात गुंफून एकपावलाने वाटचाल करण्याची प्रेरणा दिली असावी! अन्यथा हा केवळ देहव्यवहार उरला असता प्राणीजगतातला!

मराठीतल्या एकांड्या ‘मी’ चं अनेकवचन म्हणजे आपण…  हिंदीतल्या मैं चं बहुवचन म्हणजे हम! या अनेकवचनांत एकापेक्षा अधिकजणही असू शकत असले तरी याचा ‘आपण दोघं’ हा अर्थ गृहस्थाश्रमी माणसांना अधिक भावणारा!

माणसं व्यवहारानं,प्रेमानं,योगायोगानं आयुष्यभरासाठी एकत्र येतात आणि मग चार पावलं असली तरी वाट आणि चाल एक होऊन जाणं साहजिक,सहज होऊन जातं. आणि मग जसजसा रस्ता पावलांना पुढे पुढे नेत राहतो तसतशी पावलांना एकमेकांची मोहिनी पडत जाते..हाताच्या बोटांना गुंफलेले राहण्याची गोडी अनुभवण्याचे सुख सोडवत नाही….जसा जीव देहाला बिलगून रहावा तसंच की हे!

वाटेत ठेचा लागूही शकतात,नव्हे लागतातच. पण सावरायला सोबत असतं आपलं माणूस. क्षणिक रागाचे खाचखळगे एखाद्या अंधा-या वळणावर दबा धरून बसलेले असतात आणि पावलं त्यांच्या जाळ्यात अडकतातही कधीकधी नकळतपणे….पण जाणती मनं हात सोडत नाहीत सहजी! यातूनच हातांची आणि काळजांची गुंफण अधिकाधिक घट्ट होत जाते.

पण….मन चिंती ते वैरी न चिंती असं म्हणतात ते का असंच? संसारसुखाचा चषक ओठांना स्पर्शत राहून प्रेमरस जिव्हेला तृप्ततेचा अभिषेक घालीत देहात उतरत जात असताना हा अमृतचषक रिता होत जातो आहे, याची नकोशी जाणीवही उभी असते आतल्या मनातल्या अंगणात अंग चोरून. आपण माळरानावर उभे असावं आणि बोचरा वारा वाहू लागावं मधूनच…या बोचरेपणातून देहाची सुटका नाही. पण हा बोचरा वारा काही सतत येत-जात नाही….अगदी विसर पडून जातो त्याचा. आणि मग तो हळूच अवतरतो.

जगण्याच्या या प्रवासातल्या सोबतीला हमसफर,हमराह म्हणतात हिंदीत,ऊर्दुत. यातला हम मात्र सोबती अशा अर्थानं आणि सफर म्हणजे अर्थातच प्रवास! अखेरच्या श्वासापर्यंत सोबत करण्याच्या आणाभाका घेतलेल्या असल्या तरीही ही  प्रेमसरिता मध्येच खंडीत होऊ नये असं वाटतंच….जगातल्या इतर कोरड्या नद्या पाहून. शेवटी इतरांच्याही अनुभवांची गोळाबेरीज करत असतंच हृदय. विरह म्हणजे दुसरं मरणच. म्हणून ती दोघं एकमेकांना हळुवारपणे सांगू पाहताहेत…रस्त्यात कुठलं वळण कधी येईल याचा भरवसा नाही…..

किसी राह में…किसी मोड पर…कहीं चल न देना तू छोडकर…मेरे हमसफर…मेरे हमसफर!

तु एखाद्या आंधळ्या वळणावर हात सोडून जाणार नाहीस ना माझा हात सोडवून घेऊन?

किसी हाल में किसी बात पर…..कहीं चल न दे ना तू छोडकर!

विपरीत परिस्थिती निर्माण झाली तरी,एखाद्या गोष्टीवरून तु मला गमावणार तर नाही ना?

मेरा दिल कहे कहीं ये न हो, नहीं ये ना हो

किसी रोज तुझसे बिछड के मैं तुझे ढुंढती फिरूं दर-बदर.

माझं मन सतत आशंकित असतं…असं नाही ना होणार? नकोच तसं व्हायला….आपण एकमेकांना पारखे झालोत आणि मग एकमेकांना शोधत रानोमाळ भटकत आहोत…असं नको व्हायला.

तेरा रंग साया बहार का तेरा रूप आईना प्यार का

तुझ्या मनाचा रंग जणू चैत्रपालवीची ओली सावली आणि तुझं दृश्यरूप म्हणजे प्रेमाचं दर्पण…विविध रंगछटा उभं करणारं.

तुझे आ नजर में छुपा लूं मैं तुझे लग न जाये कहीं नजर!

तुला जगाच्या अप्रिय नजरेपासून लपवून ठेवण्यासारखी एकमेव जागा म्हणजे माझ्या डोळ्यांच्या पापण्या…त्यांच्या आड तु सुखरूप.

तेरा साथ है तो है जिंदगी तेरा प्यार है तो है रोशनी.

जीवनाचं दुसरं नाव म्हणजे तुझा सहवास. तुझी प्रीती म्हणजे या वाटेवरलं प्रकाशाचं झाड. श्वास क्षितीजापल्याड जायला केंव्हा निघतील काही सांगता येत नाही मर्त्य मानवाला.

कहॉं रात हो जाए क्या खबर..

या जाण्यादरम्यान अंधार गाठेल तेंव्हा तुझ्या निरंजनातील ज्योतीचा स्निग्ध उजेड पुरेसा होईल!

आनंद बख्शी! सामान्यांच्या असामान्य भावनांना शब्दरूप देणारे कवी. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी मातृसुखाला पारखे झालेल्या या माणसाला आपल्या वडिलांचं पत्नी-विरहदु:ख त्यावेळी समजलं असेल की नाही ठाऊक नाही.पण विरहवेदनेची जाणीव त्यांना पुढील आयुष्यात कुठे न कुठे अनुभवायला निश्चित मिळाली असावी. त्याशिवाय नेमके आणि तरीही साधे शब्द लेखणीतून प्रसवत नाहीत. प्रारंभीच्या उमेदीच्या काळात ब्रिटीश नौदलात कनिष्ठ साहाय्यकाची नोकरी, ब्रिटीशांविरोधी उठावत सहभागी झाल्याने झालेली अपमानास्पद हकालपट्टी,स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय फौजेत केलेली अल्पकाळ सेवा यानंतर आनंद बख्शी (बक्षी नव्हे!) सिनेसृष्टीत आले आणि रमले! मदनमोहन यांच्या नंतर सैनिकाचा संगीतकार झालेला कदाचित दुसराच माणूस. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अंगिकारलेल्या या कवीने शेकडो गाणी लिहिली. आनंदजींसारखी, केवळ आठ मिनिटांत एखादे संपूर्ण गाणे लिहिण्याची हातोटी फार कमी कवींना लाभलेली असेल!

मेरे हमसफर (१९७०) हिंदी चित्रपटासाठी आनंदजींनी लिहिलेल्या या गीताला लतादीदींशिवाय अन्य कुणी न्याय देऊ शकलं असतं का ही शंकाच आहे. मुकेशजींना हे गाणं देण्याचा आग्रह धरणा-या आनंदजींना मुकेश यांच्या साध्या,सरळ स्वरांचं सामर्थ्य माहीत होतं….कारण सर्वसामान्यांचं भावजीवन नजरेसमोर उभे करणारे शब्द सर्वसामान्यांनाही गुणगुणता यावेत असं गायलं जावं असं त्यांना वाटत होतं आणि यासाठी मुकेशच हवे होते.

आनंदजींच्या या शब्दांना चालीचं कोंदण द्यायला आणखी एक आनंदजी होते आणि त्यांच्यासोबतीला कल्याणजी! मनात भक्तीभावना निर्माण करण्याचं सामर्थ्य असलेला कर्नाटकी संगीतातला राग चारूकेशी त्यांनी निवडला आणि ताल रूपक. अतिशय हळूवारपणे संतुर श्रवणेद्रिंयाला साद घालत येते….सोबतीला नाजूक परंतु तितकाच स्पष्ट तबला…आणि बासुरी! आणि लगेच लता नावाच्या स्वरपालखीत विराजमान होऊन शब्द उमटतात…किसी राहे में..किसी मोड पर! यानंतर येणा-या कहीं शब्दाची तर मोठी खुमारी. एकच शब्द तीन अर्थाने ऐकवणं म्हणजे स्वरांची पूजा केल्यावरच प्राप्त होणारा कृपाप्रसाद! एक ‘कहीं’ म्हणजे कुठेतरी किंवा कुठेही..अर्थात स्थान निश्चित नसलेलं स्थळ. तु मला सोडून तर जाणार नाहीस ना? दुसरा ‘कहीं’ म्हणजे शक्यता,शंका,आशंका अशा अर्थाने..प्रश्नार्थक! या ‘कहीं’ ला ‘नहीं’ चं गोड यमक म्हणजे गुलाबावर शिंपडलेलं कस्तुरी अत्तर. या कहीं चं उत्तर नकारार्थीच यावं अशी वेडी आशा असतेच मनात कहीं न कहीं ! सतार हळूच डोकावून जाते ओघात. एका कडव्यानंतर तेरा रंग साया बहार का म्हणत मुकेशजींनी गाण्यात केलेला पुन:प्रवेश सुखावणारा आहे.

हे गाणं संपावंसं वाटत नाही…जसा आपल्या प्रिय व्यक्तीचा सहवास संपावा असं वाटत नाही तसं. कुणाचं जाणं न जाणं आपल्या हाती नाही ठेवलं विधात्यानं. पण जाऊ नकोस असं आर्जव करण्याची ताकद मात्र ठेवली आहे. कुणी सांगावं मनाच्या या आर्ततेमुळं एखाद्याचा इथला मुक्काम आणखी थोडा वाढू शकेल!

५४ वर्षे हे गाणं हळव्या माणसांच्या मनाचा ठाव घेत आलं आहे…आणि जोपर्यंत मानवी जीवनात आत्मिक प्रेमाला जागा असेल तोवर अशी गाणी ऐकली,गायली,गुणगुणली जातीलच. या गाण्यासाठी आनंद बख्शींना अगणित हृदयं तळापासून धन्यवाद देत असतील, यात शंका नाही.

            (मनात येतं ते शब्दांत उतरवण्याची ऊर्मी दाटून येते आणि मग असं काहीबाही लिहिलं जातं. यानिमित्तानं आपल्याही भावनांची उजळणी होते हा स्वार्थ!) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ देवपूजा… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

??

☆ देवपूजा… ☆ श्री सुनील शिरवाडकर

आमचे एक शेजारी होते. मला आठवतं ते रोज सकाळी दहा वाजता पुजेला बसायचे.अगदी साग्रसंगीत पुजा चालायची त्यांची.दोन अडीच तास.नंतर मग नैवेद्य वगैरे.त्यांची ही पूजा इतक्या वर्षांनंतरही.. म्हणजे जवळपास चाळीस वर्षांनंतरही मला आठवते यांचं कारण म्हणजे टीव्ही.त्यांचं देवघर  एक मोठ्ठा कोनाडा होता.इतका मोठा कि त्या कोनाड्यात ते स्वतः सुद्धा बसत.तर त्या मोठ्ठ्या कोनाड्यात त्यांनी एक छोटासा टीव्ही बसवुन घेतला होता.अगदी छोटा.. ब्लॅक अँड व्हाईट.एकीकडे पूजा.. मंत्र.. अभिषेक आणि दुसरीकडे टीव्ही बघणं.आरतीच्या वेळी मात्र तो टीव्ही बंद होई.

त्यांना या बद्दल बरेच जणांनी टोकलं.. टीकाही केली.पण त्यांच्यावर काही परीणाम झाला नाही.त्यांचं म्हणणं मी मनापासुन पूजा करतो.. माझ्या मनातला भाव महत्त्वाचा.. आणि माझा देव तो भाव जाणतो.त्यांची देवाला एकच प्रार्थना असायची.

‘तु पारोसा राहु नकोस..मला पारोसा ठेवु नको.’

याचाच अर्थ रोज स्नान करून तुझी पुजा करण्या इतपत मला फिट ठेव. आणि खरंच.. आयुष्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत ते पुजा करत होते.स्नान करुन पूजा करण्याएवढी त्यांची शारीरिक क्षमता अखेरपर्यंत टिकून होती. देवानं त्यांची प्रार्थना ऐकली होती.

रोज पूजा करण्याचा नियम अनेकांचा असतोच.प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत वेगळी.. कालावधी वेगळा.कोणाची पुजा पंधरा मिनिटांत होते..तर कुणाला दोन तासही लागतात.कुणाला पुजा करताना मदतीसाठी बायको लागते.तिनं मागे बसुन गंध उगाळून द्यायचं..फुलं हातात द्यायचे..तीन पर्ण असलेली बेलाची पानं नीट निवडून द्यायची .काही जण पूजा झाली की तिथुन लगेच उठुन जातात ‌मग बायकोने बाकीचा पसारा आवरायचा.

एकाची पुजेची पध्दत काही औरच होती.तो ताम्हणात देव काढायचा.. आणि सरळ वॉश बेसिनखाली धरायचा अगदी भांडे विसळल्या सारखं.मग ते देव कोरडे करून हळदी कुंकु लावायचा..शिंपडल्या सारखं.फुलं वाहिली की झाली पुजा.

अलीकडे काहीजण खुर्चीत बसूनही पुजा करतात. गुडघ्यांच्या प्रॉब्लेम मुळे मांडी घालून बसता येत नाही. मग खुर्चीत बसायचं..आणि पुढे टी पॉय  ठेवायचा..त्यावर ताम्हाण..

मंदिरांमध्ये पूजा करण्याची पद्धत वेगळी असते. तिथे देवाच्या मुर्तीला रोज मंगलस्नान..म्हणजे पूर्ण अभिषेक घातला जात नाही. केली जाते फक्त पाद्यपुजा.फक्त एकादशी आणि सणांच्या दिवशी पुर्ण मूर्तीला अभिषेक केला जातो.

गुरुचरित्रात एका अध्यायात पुजे बद्दल विस्ताराने मार्गदर्शन केलं आहे.पुजेला बसण्यासाठी कोणतं आसन घ्यावं इथपासून त्यात सांगितलं आहे.पळी पंचपात्र कुठे ठेवावं.. निर्माल्य कसं काढावं..शंखपुजा,कलश पुजा, निरांजनाची पुजा करावी‌‌‌‌.. ही पूर्वतयारी झाल्यावर मग चारी दिशांचं पूजन करावं.पुरुष सूक्तामधील वेगवेगळ्या ऋचा म्हणत अभिषेक करावा.त्यातही कोणत्या क्रिया करताना ऋचा म्हणाव्या हेही सांगितलंय.

अभिषेक झाल्यानंतर फुलं कशी वहावी.. कोणत्या देवाला कोणती पुष्पें अर्पण करावी..कोणती वर्ज्य करावी हे सांगितलंय..काही फुलं ही दुसर्या दिवशी पण शिळी समजली जात नाही हे पण सांगितलंय.निरांजन ओवाळताना कोणता मंत्र म्हणावा ..सगळं सगळं विस्ताराने सांगितलंय.

इतकी शास्त्रशुद्ध पूजा आजच्या जमान्यात तशी कठीणच..पण जशी जमेल तशी पूजा आजही घरोघर होतेच.व्यंकटेश स्त्रोत्रात तर अगदी थोडक्यात पूजेचे सुंदर वर्णन केलंय.

करुनी पंचामृत स्नान.. शुद्धोदक वरी घालुन

तुज करु मंगलस्नान.. पुरुषसूक्ते करुनिया

वस्त्रे आणि यज्ञोपवीत.. तुज लागी  करु प्रित्यर्थ

गंधाक्षता पुष्पें बहुत.. तुजलागी समर्पूं

धूप दीप नैवेद्य.. फल तांबुल दक्षिणा शुद्ध

वस्त्रे भूषणे गोमेद.. पद्मरागादी करुनी

ऐसा षोडशोपचारे भगवंत.. यथाविधी पुजिला ह्रदयात

मग प्रार्थना आरंभिली बहुत.. वर प्रसाद मागावया.

पूजेचे असं वेगवेगळं वर्णन.. मार्गदर्शन बऱ्याच ग्रंथात आहे.अगदी तश्याच पध्दतीने पूजा झाली पाहिजे असं नाही.खरंतर कोणताच देव  पूजा करा म्हणत नाही.पूजा ही देवासाठी नसतेच मुळी.ती असते आपल्यासाठी.आपलं मन प्रसन्न करण्यासाठी.आपण या कारणाने देवापुढे तासभर बसतो.कधी अथर्वशीर्ष..कधी रुद्रातील मंत्र म्हणतो..देवाला स्नान घालतो.छान लाल सुती रुमालाने देवाचं अंग पुसतो.अष्टगंधाचा टिळा लावतो.. हळदीकुंकू लावतो..मग फुले वहातो..त्यानंतर धुपदिप.. नैवेद्य..आरती.

असं सगळं झाल्यावर मग देवघरातील देवाचं ते रुप..नजर हटत नाही त्यावरुन.कानात अजुनही ‘घालीन लोटांगण..’ मधील शब्द निनादत असतात..

अष्टगंध..अत्तर..उदबत्ती..रंगीबेरंगी सुवासिक फुले या सर्वांचा संमिश्र दरवळ.. देवाच्या कपाळावरचं ते ओलसर ताजं  गंध.. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे‌‌ देवाच्या चेहर्यावरंच मंद स्मित..ते प्रसन्न सुहास्य.जणु देव सांगत असतो..आता नि:शंक मनाने कामाला जा..मी आहे तुझ्यासोबत..

आणि साक्षात देव आपल्या सोबत असणं.. यापेक्षा अधिक आपल्याला काय हवंय? मानसिक बळ म्हणजे हेच तर असतं….. पूजा करायची ती यासाठी.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तपत्या झळा उन्हाच्या… ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

? मनमंजुषेतून ?

☆ तपत्या झळा उन्हाच्या… ☆ श्री प्रसाद जोग

सध्या  सकाळ उजाडली की कालचा दिवस बरा होता म्हणायची वेळ आलीय.दिवसेंदिवस  उन्हाळ्याचा रखरखाट वाढायला लागला. त्यामुळे तापमान नाही तर तापमान अंगाची काहिली करायला लागलंय.

उन्हाळ्याचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे.काही भागामध्ये तपमान ४४/४५  डिग्री पर्यंत वाढले आहे. तशातच लोकसभेच्या निवडणुकांचे प्रचार जोरावर आहेत.  

अश्या रखरखाटामध्ये कवींना  वेगवेगळी गाणी सुचली हे विशेष.

कवी अनिल यांना केळीचे सुकले बाग आणि वेळ झाली भर माध्यान्ह ही गाणी सुचली असावीत.सुधीर मोघ्यांना तपत्या झळा उन्हाच्या हे  लिहावे वाटले असेल.

आज ही  गाणी ऐकली की तपमानात एखाद्या डिग्रीची वाढच  झाल्यासारखे वाटेल.

सगळं असह्य व्हायला लागल्यावर अचानक एक दिवशी आकाशात काळे ढग गर्दी करतील, सोसाट्याचा वारा सुटेल,विजांचा कडकडाट होऊन वळिवाच्या कोसळधारा तप्त झालेल्या जमिनीला गारे गार करतील. मातीचा सुगंध दरवळेल.हे अनुभवत असताना शान्ता शेळके यांना आला पाऊस मातीच्या वासात ग गाण्याचे शब्द सुचले असतील..

मग एन्जॉय करा उन्हाळा सुद्धा

©  श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares