मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ या जगण्यावर शतदा प्रेम करावे — लेखक : श्री द्वारकानाथ संझगिरी ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

??

☆ या जगण्यावर शतदा प्रेम करावे — लेखक : श्री द्वारकानाथ संझगिरी ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

मी आणि आजार ह्यांची ‘दोस्ती ‘ऐन तिशीतली.

‘दोस्ती’ शब्दाने चमकलात? आजार बरोबर घेऊन जगायचं म्हटलं कि दोस्ती होते.          .                    

वयाच्या अडतिसाव्या वर्षी आमच्या दादरच्या शिवाजी पार्कला धावत फेऱ्या मारत असताना मला ह्रृदयविकाराचा गंभीर धक्का जाणवला. माझा भाऊ डाॅक्टर प्रकाश संझगिरीने मला वाचवलं. मी आठवड्याने दक्षिण कोरियातल्या ‘सोल’ ला ऑलिंपिक कव्हर करायला जाणार होतो. तो थेट आयसीसीयूत जाऊन झोपलो. आयुष्य प्रथम तिथे बदललं. पण आधुनिक औषध, भावाची ट्रीटमेंट, जेवण्यातली शिस्त, बायकोचा देवावरचा विश्र्वास, मित्रांचा आधार, सकारात्मक विचार, एन्जियोप्लास्टी आणि ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ ही वृत्ती त्यामुळे मी जवळपास नाॅर्मल झालो.

त्यानंतर ३४ वर्ष भूरर्कन निघून गेली. त्यात अनंत कलात्मक उद्योग मी माझं इंजिनिअरिंग सांभाळून केले. जग फिरलो. मनाच्या एका कोपऱ्यात मृत्यूची भीती होती. पण मनाचा इतर भाग मध्यान्हासारखा उजळला होता. विविध गोष्टी करण्यासाठी मनाला नवी पालवी फुटत होती. नवा मोहर येत होता.

इतक्यात एक दिवस असा आला की सारा मोहरा फिरून गेला. 

ती तारीख होती २२ ऑक्टोबर २०२२. मी निघालो होतो ऑस्ट्रेलियाला, टी २० विश्वकपासाठी. त्यावेळची दिवाळी संपता संपता निघणार होतो. बरोबर धनत्रयोदशीला कॅन्सर नावाच्या नरकासुराने गाठलं मला. अचानक रक्ताळलेली लघवी झाली आणि दुसऱ्या दिवशीचा सूर्य अस्ताला जायच्या आत, किडणीच्या चौथ्या टप्प्यातल्या कॅन्सरचं निदान झालं.

मी हादरलो. पण स्वतःला सावरलं. सर्व विसरून तीन दिवस मुलाबाळांसह दिवाळी साजरी केली. दिवाळी संपल्यावर मी एकटाच शिवाजी पार्कच्या एका गल्लीत गेलो. रड रड रडलो. मनात साठलेलं दुःख, भीती, अश्रुतून बाहेर फेकून दिलं. अश्रु पुसले. कुसुमाग्रजांच्या कवितेतले शब्द आठवले. “सर, पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणा.” आणि लढायला सज्ज झालो.

डॉक्टर स्मृतीच्या इम्युनो थेरपिने ८ सेंटिमीटरची गाठ, वर्षभरात ५.४ सेंटिमीटर वर आली. त्याकाळात औषधांचे फार वाईट परिणाम मी सहन केले.

कधी कधी वाटायचं, “बस झाले उपचार. थांबवावं सगळं. जे काही आयुष्य त्यानंतर उरेल ते तरी नीट जगावं.” 

कधी अतिसार, कधी बध्दकोष्ट, त्यामुळे भगंदरचा त्रास. त्वचेवर लाल व्रण, जिभेची चव पूर्ण गेलेली. इडली सांबारचं सांबारही तिखट लागायचं. 

भूक नाही, खाणं कमी, त्यामुळे वजन कमी होत गेलं. मला स्वतःला आरशात पाहणं कठीण जात होतं.

डॉक्टर स्मृतीचं म्हणणं होतं, “आता ऑपरेशन करून ट्युमरग्रस्त किडनी काढून टाकावी” पण माझ्या हृदयरोग तज्ञ भावाने ती कल्पना स्वीकारली नाही. माझी ३५ वर्षाची हृदय रोगाबरोबरची मैत्री काहीतरी परिणाम हृदयावर  करणार होती. माझ्या हृदयाच्या पंपाची ताकद कमी झाली होती. ज्याला इजेक्शन रेशो म्हणतात तो ३५ वर आला होता. माझं शरीर माझ्या भावाइतकं कुणालाच ठाऊक नाही.

पण देवाच्या मनात वेगळंच होतं. त्यानेच बोटं धरून मला ऑपरेशन थिएटरकडे नेलं. 

पुन्हा दिवाळी जवळ आलेली. क्रिकेटचा विश्वकप सुरू होता. माझं लिखाण सुरू होतं. आणि एक दिवस पोटात दुखायला लागलं. आणि निदान झालं. माझ्या पित्ताशयात खडे आहेत.:

मी स्वतःशी हसलो. कारण विविध आजार माझ्या शरीरावर हल्ला करायला उत्सुक असतात. काय काय आजारांनी ३५ वर्षात माझ्या शरीराचा पाहुणचार घेतलाय! तुम्ही नाव सुध्धा ऐकली नसतील.

‘पायलोनायडल सायनस’ ऐकलंय?

एपिडीडीमायटीस, आय टीपी, वगैरे… सर्जन, डॉ हितेश मेहतांनी माझ्या भावाला सांगून टाकलं, पित्ताशय काढायलाच हवं. म्हणजे ऑपरेशन आलं.

पित्ताशय नाही काढलं तर….

तर ते आत फुटण्याचं भय मोठं. ते फुटलं तर परिणाम भयानक. म्हणजे बहुदा “आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा.” ऑपरेशनची जोखीम घ्यायलाच लागणार होती.

माझा भाऊ डॉ. प्रकाश संझगिरी हा अत्यंत हुशार डॉक्टर आहे. तो हृदयरोग तज्ञ असला तरी त्याचं इतर वैद्यकीय क्षेत्रातलं ज्ञान अद्ययावत असतं. त्याची बौध्दीक चक्र फिरायला लागली. पित्ताशय काढायला ऑपरेशनची जोखीम घ्यायची मग त्याच वेळी उजवी, ट्यूमरग्रस्त किडनी काढायला काय हरकत आहे.? त्याने विचार मांडला.

पण विचार मांडणं वेगळं आणि प्रत्यक्षात तो उतरवणं वेगळं. तो सर्जीकल स्ट्रायिक असतो. त्याचं यश वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. अत्यंत कुशलतेने आखणी करावी लागते. प्रत्येक टप्प्यावर एक नवी अडचण येते आणि त्यावर मात करून पुढे जायचं असतं.

डॉ प्रकाशने त्याचा उत्कृष्ठ संघ निवडला. ॲनेस्थेटिस्ट सर्वात महत्वाचा. बदलत्या परीस्थितिनुसार योग्य निर्णय घेणारा हवा. डॉ प्रकाशने त्याच्या विश्र्वासातला निवडला. डॉ फाल्गुनीची टीम होती. डॉ हितेश मेहता हे पित्ताशय काढणार होते. डॉ हेमंत पाठक किडनी काढणार होते. आखणी अशी होती. आधी पित्ताशय काढायचं. आणि त्यावेळेला इतर महत्वाची (vital) प्यारामिटर्स व्यवस्थित असतील तर किडनी काढायची.

ते विश्वचषकाचे दिवस होते. मी लीलावती हॉस्पिटलमध्ये बिछान्यावर पडून सामने पाहत होतो. लिहित होतो. ऑपरेशन पासून मन दुसरीकडे नेत होतो.

पण एकाक्षणी मी भाऊक झालो. मी भावाला म्हटलं, “दिवाळी नंतर ऑपरेशन करूया का?”

तो म्हणाला, “ऑपरेशन शिवाय मी तुला लीलावती बाहेर पाऊल ठेवायला देणार नाही.”

मी म्हटलं, “बरं मला तीन तास सोड. मी माझं जन्मस्थळ, माझी शाळा किंग जॉर्ज, कॉलेज रुईया, व्हि जे टी आय, शिवाजी पार्क, सावरकर स्मारकाचं स्टेज, शिवाजी पार्कचा गणपती (गणेश उद्यान) सिध्दीविनायक, वानखेडे, आणि माउंट मेरीलां जाऊन येतो.” लहानपणी मला वडील खांद्यावर घेऊन माउंट मेरीला जात असत. ते मला डोळे भरून पाहायचं होतं.

तो म्हणाला, “तू काळजी करू नकोस. ह्या सर्व ठिकाणी तू नंतर स्वतःच्या पायाने जाशील.” ह्या शब्दांनी मला धीर दिला. मनातली ऑपरेशन थिएटर मध्ये आयुष्य संपू शकतं ही भावना दूर पळाली.

ऑपरेशनच्या दिवशी माझी रवानगी आ य सी सी यू मध्ये झाली. लग्नापूर्वी वधूला नटवतात, तसं माझं नटणं झालं.

वेगवेगळ्या नळ्या शरीरात गेल्या. माझी धाकटी सून हेमांगी हळूच पडदा सरकवून आत आली आणि म्हणाली, “बाबा, काय ऐकायचंय?”

मी म्हटलं, “माझा सी रामचंद्र ह्यांचा कार्यक्रम ऐकव.” 

मी संगीतात त्या  ‘नटण्याच्या’ वेदना विसरून गेलो. नव्या आयुष्याशी लग्न करायला सज्ज होऊन मी ऑपरेशन थिएटर नावाच्या स्टेजवर उभा राहिलो. 

आठ तास ती मंगलाष्टकं चालली. शेवटच्या शुभ मंगल सावधानने सर्वांनी निःश्वास सोडला. नव्या आयुष्याच्या उंबरठयावरचं माप मी ओलांडलं होतं. 

पण हे इतकं सहज घडलं नव्हतं. माझी अँजिओप्लास्टी आणि एक प्रोसिजर आधी झालेली असली तरी मेजर ऑपरेशनचा अनुभव पहिलाच होता.

जवळचे नातेवाईक, आणि मित्र ह्यांचे हात हातात घेत ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना, त्यांच्या स्पर्शातून प्रेम आणि काळजी जाणवत होती. माझ्या अनंत मित्रांनी, चाहत्यांनी देवाकडे केलेल्या प्रार्थनेची ताकद घेऊन मी आत गेलो. आत देवाचं अस्तित्व डॉक्टरांच्या रूपात होतं. हे डॉक्टर्स त्या परमेश्वराचे दूत होते.

युरोलॉजिस्ट डॉ हेमंत पाठक, अनेस्थेटिस्ट डॉ फाल्गुनी, आणि गॅसस्ट्रो इंटेस्टाईनल सर्जन डॉ हितेश मेहता, यांची टीम माझ्याशी अत्यंत हसून बोलले, माझ्यावरचा दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. एक सुई टोचली, आणि जवळपास काही सेकंदात मी झोपेच्या अधीन झालो. अशी झोप, ज्यात स्वप्न नव्हतं, वेदना नव्हत्या, जेंव्हा झोपेतून जागं करण्यात आलं तेंव्हा मधल्या आठ तासातलं काहीही आठवत नव्हतं. मी अशी झोप एकदाच अनुभवली होती. हार्ट ॲटॅकच्या वेळी मला माॅर्फिंनचं इंजेक्शन दिलं होतं तेव्हा.

माझ्या ऑपरेशनचं वैद्यकीय भाषेतल वर्णन Laparoscopic cholecystectomy and right radical nephrectomy असं होतं. डॉ मेहतांनी जेंव्हा पित्ताशयावर हल्ला केला तेंव्हा त्यांच्या लक्षात आलं की पित्ताशयात पस झाला होता. गँगरीन झाल्याचं लक्षण होतं. प्रत्येक अवयवाला एक आवरण असतं त्या आवरणाला आणि यकृताला ते चिकटलं होतं.

चांगल्या शल्य विशारदाचे हात हे कलावंताचे हात असतात. डॉ मेहतांनी हा गुंता, अत्यंत सुंदरपणे आणि अचूक सोडवला. डॉक्टरी ज्ञान, अनुभव आणि कलेचा त्यांच्या हातात अपूर्व संगम होता. डॉ पाठकांनी त्यांना मदत केली.

त्यांनी नुसतं पित्ताशय बाहेर काढलं नाही. पोटातला टाईम बॉम्ब बाहेर काढला. माझा भाऊ हॉस्पिटलच्या बाहेर मला क्षणभरही सोडायला का तयार नव्हता, हे मला कळलं. अपेक्षेपेक्षा जास्त रक्त गेलं होतं. अत्यंत गुंतागुंतीचं ऑपरेशन पार पडलं होतं. जीव वाचला होता. 

आणि मग माझ्या भावाने मास्टर स्ट्रोक मारला. माझा भाऊ आणि दोन सर्जन ह्यात चर्चा झाली. पुढे जायचं आणि किडनी काढायची का? माझे इतर पॅरामीटर्स चांगले होते. किडनी काढून टाकायची ही उत्तम संधी होती. हे माझ्या भावाने ताडलं, आणि निर्णय घेतला, जायचं पुढे.

हा निर्णय अत्यंत धाडसी आणि महत्त्वाचा होता. 

मग डॉ पाठकना डॉ मेहतांनी किडनी काढायला मदत केली. ऑपरेशन थिएटर मध्ये वैद्यकीय ज्ञान आणि कसब पणाला लागलं होतं. बाहेर बसलेली रक्ताची आणि मैत्रीची नाती, देवाचा धावा करत होती. आणि मी शांतपणे दोन जगाच्या सीमारेषेवर गाढ झोपलो होतो. 

त्याच वेळेला वानखेडेवर अफगाणिस्तान विरूध्द ऑस्ट्रेलियाचा  सामना अटीतटीने खेळला जात होता. ग्लेन मॅक्सवेल जिवाच्या आकांताने खेळत होता. आमचे डॉक्टर्स तसेच खेळले. आणि जिंकलें. दोघंही जवळपास एकाचवेळी जिंकले. 

डॉ स्नेहाने मला जागं करून तो स्कोअर सांगायचा प्रयत्न केला. पण शुध्दी आली नव्हती. नीट शुध्द मी पुन्हा आय सी सी यू त आल्यावर आली. तेंव्हा पाहिलं लक्षात असलेलं वाक्य बायको कानात कुजबुजली, “ऑपरेशन चांगलं झालं. पित्ताशय, किडनी दोन्ही काढलं.”

भारतीय संघ विश्वचषक ऐन मोक्याच्या वेळी दबावाखाली हरला.

माझ्या आयुष्यातला हा मोठा विश्वचषक डॉक्टरांनी दबावाखाली जिंकून दिला. माझा भाऊ डॉ प्रकाश संझगिरी ह्याने ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स सारखं नेतृत्त्व केलं.

देवाने आजार दिले, पण त्यातून बाहेर काढण्यासाठी भाऊही दिला. लढाई संपलेली नाही, पण पुन्हा नवी उमेद मिळाली आहे. या जगण्यावर शतदा प्रेम करण्यासाठी.

लेखक :  श्री द्वारकानाथ संझगिरी

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “माझ्या चुका…” – लेखक : सुश्री उन्नती गाडगीळ ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

??

☆ “माझ्या चुका…” – लेखक : सुश्री उन्नती गाडगीळ ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

“पुढील महिन्यात माझ्याकडे वृद्ध आईबाबा येणार आहेत. तुम्ही तुमच्या आईसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ करत होतात. आणि असं बरचं काही माझी आई नेहमीच सांगायची. तर काय करु?

जरा pl. टिप्स द्या..” सुलक्षणा विचारत होती.–

तेव्हा मी तिला बरेच पदार्थ लिहून दिलेच. आणि वृद्ध,आजारी व्यक्ती संभाळताना माझ्या हातून झालेल्या बऱ्याच चुका सांगितल्या — म्हणजे तिने सावध रहावे.. खूप खूप चुका झाल्या-

** *** अहमदाबादला आमच्या घरी माझे वृद्ध सासु..सासरे अगदी आनंदात असायचे .पण..

एकदा सासरे फिरायला गेले.. ” नीट सावकाश जा हं !काँलनीबाहेर जाऊ नका …” या सूचना मी दिल्या.

पण.. आमच्या घराचा  नंबर व पत्ता द्यायला विसरले, ते भटकतच राहिले .त्यांना वयोमानानुसार घरनंबर आठवलाच नाही. ते सैरभैर झाले. अर्थातच मी अर्ध्या तासात त्यांना शोधत गेलेच.. दाखवलेच नाही त्यांना काही…. पण.. वयोवृद्धांना आपला पत्ता बरोबर लिहून देणे, हे महत्त्वाचे..

वयोमानानुसार त्यांना पोथी वाचन अवघड होते. हे माझ्या बऱ्याच उशिरा ..आठदहा दिवसांनी लक्षात आले..मग चूक सुधारली..रोज सकाळी वृत्तपत्रे वाचून दाखवणे. व दुपारी.. माझ्या लेकीला मांडीवर घेऊन थोपटत..अंगाई ऐवजी..त्यांच्यासाठी पोथी वाचन केले.

माझ्या सासूबाई.. हाँस्पिटलमधे होत्या. मी रोज रात्रभर असायची. हाँस्पिटल  सुसज्ज होते. तरीही –.बेडपॅन देतात..  निघून जातात. असा अनुभव आला..शारीरिक स्वच्छता करत नाहीत.. हे मला दुसऱ्या दिवशी कळले. माझी चूक झाली… मग सेवेकरींवर अवलंबून रहायचे नाही. रुग्णांची आंतर्बाह्य शारीरिक स्वच्छता, शुश्रूषा आपल्यालाच करायची आहे. हे  लक्षात घेऊन .. रोज रात्री  कडूलिंब पाणी व सकाळी उठल्यावर गुलाबपाणी त्या जागेवर शिंपून..बेबी पावडर लावून ठेवणे.. हे केले. नारळपाणी हे तर अंतर्गत शुद्धीकरण करतेच. मी पुढे सर्व रुग्णांबाबत ते पाळले.

— ती चूक वेळेवर लक्षात आली म्हणून त्या जवळजवळ दोन महिने हाँस्पिटलमधे असूनही त्यांना bed sores झाले नाहीत. माझ्या सासूबाईनी त्यांच्या बहिणीला सांगितले —

 ” संपूर्ण शरीराची स्वच्छता किळस वा आळस न करता उन्नती सतत करत होती. म्हणून बोटभर सुद्धा जखम झाली नाही.”

पहिल्याच दिवशी मी नर्सवर भरोसा ठेवला ही चूक लक्षात आली, म्हणून  बरे झाले. धडा घेतला.. कुणावरही  अवलंबून रहायचे नाही, स्वतः रुग्णसेवा करायची.

**** माझी आई आजारी असताना..(स्मृती भ्रंशाने तिला बोलता येत नव्हते) अल्झायमर पराकोटीचा  होता. ती माझ्याकडे येऊन दोनच दिवस झाले होते. तिला आईस्क्रीम भरवताच… एकदम ती किंचाळली.. चवताळली..मला मारत सुटली..माझे केस उपटले. कडकडून चावली. चूक तिची नव्हती.(तिला स्मृती भ्रंश होता. या भयंकर आजाराच्या शेवटच्या टप्प्यावर..रुग्ण हिंसक बनतो. चवताळतो, बेदम मारतो. नाते विसरतो. जवळच्या व्यक्तीला सहन करावेच लागते. व मार खाणे असह्य झाले तर दूर ठेवावेच लागते.नाईलाजाने. )

—  तिला तो गार स्पर्श  सहन झाला नाही. चूक माझी होती. मग लक्षात आले.. वार्धक्यात आईसक्रीम खूप खूप गार चालत नाही.. जरा वेळाने.. तिने आवडीने खाल्ले..आणि पुढे नंतरही मी ती चूक सुधारली..अति गार काही दिले नाही. व तिनेही आनंदाने चाटून पुसून खाल्ले…. प्रत्येक क्षण कसोटीचा होता.

**माझे वडील….  त्यांना नागीण झाली होती. त्यामुळे व वाढत्या वयानुसार थकल्याने हातात जोर नव्हता. त्यामुळे त्यांना आंघोळ घालणे, कपडे घालणे, जेवताना.. पोळीचे तुकडे करून देणे, मुख्य म्हणजे पाठीला ,पायांना मालीश करणे हे सर्व मी करत होतेच…

*वडिलांना आंघोळ  घालून त्यांचे अंग पुसताना लक्षात आले की म्हातारपणात  कातडी नाजूक होते. म्हणून टर्कीश  टाँवेल, V.I.P. Shorts  वापरणे योग्य नाही. नाजूक कातडी दुखावते… आपले वडील हेच मुळात आपल्या साठी.. V.I.P. असतात. हे लक्षात आल्यावर पंचा, कोपऱ्या, लुंगी मागवून ती सुखद वस्त्रे  वापरली.

* कवळीची डबी उघडून कवळी घासण्यासाठी हातात घेतली तेव्हा लक्षात आले.. छी.. छी.. छी–

दात किती अस्वच्छ.. कवळीतील तीन दात तुटलेले.. काही दात झिजलेले.बघून मी स्वतःला लाखो दुषणे देऊ लागले. दर महिना वडील माझ्या घरी येतात. किमान पाचसहा दिवस राहतात. त्यांची कवळी वीस वर्षांपूर्वीची होती. बदलायला हवी, हे माझ्या लक्षात कसे आले नाही?

केवढी मोठी चूक झाली माझी !!!

मी लगेचच डेंटिस्टला फोन करुन.. ‘ ते रुग्ण आहेत. आपण येऊन  बघता का? नवी कवळी करुन देता का?’  विचारले. माझ्या विनंतीवरून  ते  बहुमल्य वेळ खर्चून आले. माप वगैरे घेऊन.. अर्ज़ंट कवळी बनवून दिली. माझे वडील जेव्हा जेव्हा आमच्या घरी येत, ..तेव्हा..त्यांना चष्मा पुसून देत होते..नखे कापून देत होते.. डोळ्यात औषध घालून देत होते. तेल लावून देत होते, तेव्हा दात/कवळी स्वच्छ आहे की नाही, हे पहाणे मी कशी विसरले बर? खरच मोठी चूक झाली होती–माझी !!!

आणि खरं म्हणजे मी अगदी माझ्या नवव्या वर्षीपासून माझ्या आजोबांची कवळी घासून पुसून लख्ख करणे, पायांना, पाठीला मालीश करणे.. हे संस्कार आमच्यावर बालपणापासून आहेतच…तरीही माझ्या लक्षात आले नाही? चुकलेच माझे !!! अस्वच्छ दात मुखात असताना.. मी काळजीपूर्वक केलेले पदार्थ पचणार कसे??? डॉ.नी माझी समजूत घातली.. तुम्ही रोज खीर/दुध,आणि सार/सूप्स /नारळ पाणी ,आणि मऊ पातळ खिचडी वगैरे देत होतात तेव्हा ते दात लावत नव्हते. खरं म्हणजे..तेव्हढेच पुरेसे असते.जास्त खायचेच नसते इतके आजार असणाऱ्यांनी !!!…. वगैरे. पण चूक ती चूकच होती.

ते पुण्यात गेल्यावर रोज फोनवर सांगायचे..

आंघोळ घालणे, कवळी साफ करणे, बूटसाफ करून  घालणे. गरमागरम पौष्टिक आहार वेळेवर देणे…प्रत्येक वेळी तुझी आठवण येते. येथे काही नीट कुणी करत नाही…  वगैरे.. मी हसत असे.

कारण  काही  व्यक्तींना सवय असते–प्रत्येकाला तोंडावर.. “तू किती माझी काळजी घेतेस,नाही तर ती.. 

हे प्रत्येकाला म्हणणे. हा मनुष्य स्वभाव असतो.त्यामुळे स्वतःच्याच मुलांच्यात भांडणे होतात. हे त्यांच्या लक्षात येत नाही.

— हे मी पूर्णपणे लक्षात ठेऊन ती चूक आम्ही पुढे करणार नाही..असे मनाशी ठरवले आहे. 

****माझ्या मोठ्या नणंदताई  रूग्ण म्हणून माझेकडे होत्या. दोन्ही डोळ्यांना पट्टी होती.

सेवा करायला बाई ठेवली की नीट करत नाही.. हा अनुभव गाठी होता. म्हणून  त्यांचे सर्वकाही मी करत होते. दुखणे डोळ्यात होते. बाकी त्या हसून खेळून मजेत होत्या. गप्पा, टप्पा, गाणी-गोष्टी चालू असत.

त्यांच्या डोळ्यांवर पट्टी आहे  म्हणून मी खरतर त्यांना आंघोळ घालणे, वगैरे सर्व काही करत होते.तरीही अनावधानाने..मी–एकदा..'””ताईवन्सं ,या लवकर ! तुमच्या आवडीचे गाणे लागले आहे. बघायला या””

असे बोलले. असेच एकदा..”‘ताई वन्सं, बेल वाजली. दार उघडता का? मी कणीक भिजवत आहे. आणि मला दुसऱ्या अधू हाताने दार उघडता येत नाही !” असे मी चुकून बोलले

त्यांना किती वाईट वाटले असेल ना..नंतर आम्ही दोघी खूप खूप हासलो..आंधळ्या–पांगळ्याची जोडी !

त्या समजून घेणाऱ्या होत्या म्हणून.. माझ्या चुकीवर हासून पांघरूण घातले.

— ते सर्व झाले. पण जी चूक झाली ती चूकच असते..

— आणि प्रत्येकावर अशी आबालवृद्धांचे संगोपन करण्याची वेळ येतेच. .. जागृत रहावे..

लेखिका : सुश्री उन्नती गाडगीळ

प्रस्तुती : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ – शुभ्र फुलांची ज्वाला…— ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ – शुभ्र फुलांची ज्वाला – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

(१० फेब्रुवारी… थोर विदुषी दुर्गाबाई भागवत यांचा जन्मदिन… त्यानिमित्ताने त्यांच्या सहवासातील प्रसन्न आठवणी…)

ज्वालामुखीचा उद्रेक आणि बर्फासारखं शीतल व्यक्तिमत्व,तुम्ही कधी एकत्र पाहिलंय का? होय,मी केवळ पाहिलंच नाही, तर त्यातला प्रेमळ, खळखळ वाहणारा, नितळ, शुभ्र झराही अनुभवलाय. हिमालयाची उंची गाठलेलं हे व्यक्तिमत्व कोण बरं असेल? वयानं माझी आजी शोभेल,असं आमचं नातं जुळलं आणि हळूहळू आम्ही मैत्रिणीच बनून गेलो, हे माझं अहोभाग्य! ही मैत्रीण, अर्वाचीन काळातली गार्गी,मैत्रेयी-म्हणजे थोर साहित्य विदुषी दुर्गाबाई भागवत !

केवळ साहित्य विदुषीच नव्हे,तर दुर्गाबाई म्हणजे अखंड ज्ञानयज्ञ! स्वातंत्र्यसेनानी पासून ते स्वयंपाक, विणकाम, भरतकामापर्यंत कुठल्याही क्षेत्रात दुर्गाबाई अग्रेसर! अंगकाठी किरकोळ, क्षीण जरी असली तरी वयाच्या नव्वदीतही बाईंची कुशाग्रबुद्धी, तोंडात बोटच घालायला लावे. शरीर पेलवत नसतानाही,”आत्ता मी तुम्हाला व्यायाम करून दाखवू का?” म्हणून झटकन् उठायचा प्रयत्न करणाऱ्या दुर्गाबाई पाहिल्या, की त्यांच्या मनाचा अवखळपणा, उत्साह,अगदी लहान मुलासारखा अखेरपर्यंत टिकून होता, हे जाणवतं.

दुर्गाबाईंची ओळख झाल्यावर, त्यांची बरीच पुस्तकं वाचली. सध्या दुर्गाबाईंचं ‘दुपानी’ हे पुस्तक ५व्यांदा वाचतेय.परत परत वाचूनही कंटाळा येत नाही. कारण वाचताना, त्या प्रत्यक्ष समोर बसून बोलताहेत असंच वाटतं. मला त्यांचं लेखन ‘प्रांजळ’ तरीही सडेतोड, थेट मुद्द्याला हात घालणारं (आणि अंत:करणालाही) म्हणूनच चिंतनीय व विचार करायला प्रवृत्त करणारं वाटतं. दुर्गाबाई म्हणजे पी.एच.डी करण्यासारखाच विषय ! डॉ.मीना वैशंपायन, प्रतिभा रानडे यांसारख्या नामवंत  लेखिकांनाही त्यांच्यावर पुस्तक लिहावंसं वाटणं आणि लिहूनही बरंच काही सांगायचं उरलंय असं वाटणं, यातच सारं आलं.नव्वदीतही त्या अर्धमागधी भाषेतील ‘विशुद्धीमग्ग’चा वजनाला न पेलवणारा ग्रंथ मराठीत अनुवादित करत होत्या. त्यांचा नवनव्या गोष्टी करण्याचा, शिकण्याचा ध्यास पाहून आश्चर्य वाटतं.

बाईंचा ९० वा वाढदिवस त्यांच्या सुनबाई चारुताईंनी घरीच पण थाटात साजरा केला. त्यावेळी पत्रकार, टी.व्ही चॅनेल मंडळी जमली होती. अचानक बाईंनी मला, त्यांना आवडणारा संत एकनाथांचा अभंग गायला सांगितला. मी मनोभावे गायले. गाणे झाल्यावर बाईंनी कौतुकाने पाठ थोपटून माझा हात हाती घेतला, व थंडगार हात पाहून, उत्स्फूर्तपणे म्हणाल्या, “Cold from outside, Warm from inside…!”

समाजात श्रेष्ठ वा थोर व्यक्ती कोण, याची व्याख्या करायची तर, सहज सोपी व्याख्या म्हणजे, जी व्यक्ती आपल्या सद् गुणांमुळे, आजूबाजूच्या व समाजातल्या इतरांनाही घडवते; ती व्यक्ती थोर! माझ्या जडणघडणीत मला आदरणीय कुसुमाग्रज,इंदिरा संत,आणि दुर्गाबाई भागवत म्हणजे ‘ब्रह्मा,विष्णू,महेश’च वाटतात. तात्यासाहेबांनी (कुसुमाग्रज) प्रेमळ आज्ञा केल्याने, इंदिराबाईंच्या, शंकर रामाणींच्या व त्यांच्या स्वतःच्या कवितांच्या,’रंग बावरा श्रावण’ व ‘घर नाचले नाचले’ ह्या कॅसेट्स तयार झाल्या. प्रत्येक कवीचं व्यक्तिमत्व अभ्यासण्याच्या निमित्तानं, कविता व इतर साहित्याचंही भरपूर वाचन केलं गेलं. इंदिरा संतांनी तर मला अक्षरशः कवितेचं वेडच लावलं. या दिग्गजांच्या कविता गाता गाता एके दिवशी नवलच घडलं… शाकंभरी पौर्णिमेच्या पहाटे,दुर्गाबाईंना त्यांच्या वडिलांनी (स्मृतिदिनी) त्यांच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. दुर्गाबाईंनी पहाटे चंद्रबिंब ‘अस्त’ होताना पाहून त्यांना स्फुरण आलं, ते असं –

|| देहोपनिषद ||

आयुष्याची झाली रात, मनी पेटे अंतर्ज्योत ||१||

भय गेले मरणाचे,कोंब फुटले सुखाचे ||२||

अवयवांचे बळ गेले,काय कुणाचे अडले ||३||

फुटले जीवनाला डोळे, सुखवेड त्यात लोळे ||४||

मरणा तुझ्या स्वागतास, आत्मा माझा आहे सज्ज ||५||

पायघडी देहाची ही, घालूनी मी पाही वाट ||६||

सुखवेडी मी जाहले, ‘देहोपनिषद’ सिद्ध झाले ||७||

आणि नेमकं त्याच दिवशी मी, दुर्गाबाईंना इतर नव्या कविता म्हणून दाखवायला गेल्यावेळी, त्यांनी त्यांची, ही ‘एकमेव’ कविता माझ्या ओंजळीत दिली, व म्हणाल्या; “यापूर्वीच्या मी केलेल्या कविता मला नावडल्याने, मी त्या फाडून, जाळल्या. परंतु या देहोपनिषदाला तू सुंदर चाल लावून, उद्या दूरदर्शनवरील माझ्या मुलाखतीत गावंस, अशी माझी इच्छा आहे.” ‘देहोपनिषद’ हे अभंगाचं नाव वाचूनच, माझे धाबे दणाणले! मरणाला असे ठणकावून सांगणारी बाईच पाहिली नाही मी! कविताही चालीत बांधायला प्रथमदर्शनी कठीण वाटली. परंतु दुर्गाबाईंची आज्ञा – नाही म्हणायची माझी प्राज्ञाच नव्हती. मी त्याक्षणी तरी हो म्हटलं व घरी पोहोचेपर्यंत संगीत दिग्दर्शनाची माझ्या ‘मनी अंतर्ज्योत’ पेटली! शब्दाशब्दाला न्याय देणारी,सुसंगत वाटेल अशीच चाल परमेश्वराने सुचवली…

दुर्गाबाईंनी माझ्या या पहिल्या पाऊलाचं, दुसऱ्याच दिवशी  दूरदर्शनवर “आता ‘नारददुहिता’ सुंदर गाणार आहे” म्हणून मोठ्या मनानं कौतुक केलं. बाळाचं पहिलं पाऊल पडलं आणि आत्मविश्वास आला की, त्याला जसे कुठे धावू आणि किती धावू असे पाय फुटतात, तशी मी – इंदिराबाई, कुसुमाग्रज, शंकर रामाणी, अटलजी, व्ही.पी.सिंग यांच्या, तसंच दुर्गाबाईंनी निवडलेले संत नामदेव, एकनाथांचे अभंग व इतर नवोदितांच्याही साठ एक कवितांना धडाध्धड चाली लावत गेले. अर्थात, प्रत्येक शब्दाला स्वरांनी न्याय दिला पाहिजे या निकषावर ! माझ्या लेखी, शब्दांमुळे सुरांना आणि सुरांमुळे शब्दांना अर्थ आला. केवढी भव्य नि सुंदर दृष्टी दिली दुर्गाबाईंनी मला ! या तिघांनीही मला कुबेराचं एक दालनच मोकळं करून दिलं, गर्भश्रीमंत केलं! हा खजिना, केवळ पुस्तकात न राहता, रसिकांसमोर सादर करण्याचं, कॅसेटद्वारे घराघरात पोहोचवण्याचं काम, नाशिकच्या भालचंद्र दातारांनी केल्यानं, दुर्गाबाईंनी त्यांचं खास अभिनंदनही केलं. तसंच माझी या परिवारातर्फे निघालेली पहिली ध्वनिफीत – ‘ही शुभ्र फुलांची ज्वाला’ चे प्रकाशनही दुर्गाबाईंच्या शुभहस्ते झालं. त्यावेळी बाई सुंदर बोलल्या आणि गंमत म्हणजे, खच्च भरलेल्या सभागृहासमोर राग केदारची बंदिश गायल्यादेखील!

एकदा त्या आणि डॉ.कमलाताई सोहोनी (त्यांच्या भगिनी आणि भारतातील पहिली महिला शास्त्रज्ञ) जपानी चित्रपट पाहात होत्या. त्यातील स्वेटर विणणाऱ्या नायिकेने त्यांचे लक्ष वेधले. ती वेगळ्या पद्धतीने टाके विणत होती. तसे विणल्यास एका व्यक्तीचा, एका दिवसात स्वेटर पटापट विणून तयार होतो, असे त्यांनी बारकाईने पाहून, स्वतः प्रत्यक्ष विणून एका दिवसात एक स्वेटर तयार केला. बाईंची इतकी विलक्षण वेधक नजर ! कमलाताईंच्या निधनानंतर बाईंनी त्यांच्या ‘सपाता’ देखील पुजल्या. असं राम-भरतासारखं अलौकिक प्रेम!

कधीकधी दुर्गाबाई आणि इंदिरा संतांचं नातं पाहिलं, की मला पंडिता रमाबाई आणि डॉ.आनंदी जोशी आठवतात.दोघी मनस्वी,विद्वान,प्रखर स्वाभिमानी असूनही, एकमेकींबद्दल प्रचंड आदर,प्रेम बाळगणाऱ्या. दोघींनाही एकमेकींना भेटण्याविषयीची प्रचंड ओढ…समानशीलेषु व्यसनेषु सख्यं… हेच खरं! मी मुंबईहून बेळगावला इंदिराबाईंकडे जाताना व परतताना, दोघींनी एकमेकींना दिलेल्या ‘अनुपम पत्रां’ची पोस्टमन होण्याचं भाग्य मला लाभलं!

बाईंच्या तीन गोष्टी प्रामुख्याने मी कधीच विसरणार नाही, एक म्हणजे ‘रिकामा अर्धघडी राहू नको रे…’ त्यामुळेच, इतक्या विविध विषयात त्या प्रभुत्व मिळवू शकल्या. त्यांच्या हातची वाटाण्याच्या सालीची उसळ सुद्धा इतकी चविष्ट, स्वादिष्ट असे की, एकदा मी त्यांना या विशेष खमंगपणाबद्दल, ‘प्रमाण’ विचारले! त्या म्हणाल्या, “अगं मीही सगळ्यांसारखंच करते, फक्त त्यात थोडा ‘जीव’ ओतते!” तिसरी गोष्ट म्हणजे एकदा त्या मला म्हणाल्या, “ पद्मजा, प्रत्येक दिवस हा आपला ‘वाढदिवस’ म्हणून साजरा करावा.” बाईंच्या या आणि अशा अनेक गोष्टी मी हृदयात कोरल्या आहेत. एरव्ही कमालीच्या प्रेमळ, शांत असलेल्या बाईंनी ‘कराड साहित्य संमेलना’च्या अध्यक्षा असताना, एकटीने मंचावरून ‘ज्वाला’ होऊन, आणीबाणी विरोधात शिताफीने कणखर आवाज उठवला. ही त्यांची ताकद होती!

बाईंना जसं साहित्याचं प्रेम, तसंच निसर्ग आणि तत्वचिंतनाचंही ! तत्वचिंतक थोरोच्या निसर्गप्रेमामुळेच बाईंचं त्याच्यावर प्रेम. याच थोरोवर इंदिरा गांधींनीं एक कविता केली होती. ती अशी…

“Whoever reads Thoreau,

Is struck

By the ethical force,

Of his ideas

And the clarity of his writing

 

Thoreau’s great influence

On Mahatma Gandhi

 

Is well known

His words ring long,

In the mind.

 

Those who live

In the storm of politics

Need the quiet pool within

For sustenance

 

Thoreau lived by such a pool.” – Indira Gandhi.

ही कविता वाचल्यावर दुर्गाबाईंना खूप आवडली व आणीबाणीत त्यांनी सोसलेले पराकोटीचे हाल विसरून, इंदिराजींचे सगळे गुन्हे माफ करून टाकले. केवढं पारदर्शक आणि आभाळाएवढं मन !

© सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सपोर्ट सिस्टीम…” ☆ डॉ. प्राप्ती गुणे ☆

डॉ. प्राप्ती गुणे

? मनमंजुषेतून ?

☆ “सपोर्ट सिस्टीम…” ☆ डॉ. प्राप्ती गुणे ☆

परवाच पेपरमध्ये अमेरिकेतील सुप्रसिद्ध भारतीय वंशी जर्नल सर्जन यांचे बोल वाचले.

‘एकाकीपणामुळे मनुष्याच्या तब्येतीवर कसा हानिकारक परिणाम होतो’ असे त्यांचे भाष्य होते.

काल ‘पोज’ नावाची 1980-90 दशकातलं चित्रण असणारी वेब सिरीज पाहिली. त्या काळात अमेरिकेत तृतीयपंथी लोकांनी, स्वतःच्या अस्तित्वासाठी, मूलभूत आरोग्य सेवेसाठी दिलेला लढा, त्यांची एड्स या गंभीर आजारामुळे झालेली दुरावस्था, त्यांचा खडतर जीवनप्रवास असे अनेक अतिसंवेदनशील मुद्दे,यात नाजूकपणाने हाताळले होते.

  शीर्षकाशी ह्या दोन्ही गोष्टींचा संबंध काय,असा प्रश्न आपल्याला पडलेला असेल.

.. ही वेब सिरीज पाहताना अनेक वेळा माझे डोळे पाणावले. परंतु ते दुःखद घटनांपेक्षा आल्हाददायक भावनिक प्रसंगांमुळे घडले. 

सर्वांची एकमेकांना असणारी अतूट साथ, एकमेकांच्या प्रगतीसाठी स्वतःच्या सुखाचा केलेला  निरपेक्ष त्याग, चुकांमध्ये अडकलेल्या दुसऱ्यांसाठी त्याला नावं न ठेवता, प्रसंगी स्वतः जोखीम पत्करून, धोकादायक परिस्थितींमधून त्यांना सोडवणं, स्वतःला मिळालेली जास्तीचं जीवन जगायची संधी दुसऱ्याला, ज्याचं आयुष्य जगणं अजून उरलंय, त्याला देण्यातली निस्वार्थता, पाहून कोणाचेही हृदय भरूनच येईल. मी ही त्याला अपवाद नव्हते.

त्याकाळात, समाजात अनेक गैरसमजुती व अपुरी माहिती असल्याने, स्वतःच्या कुटुंबाने झिडकारलेल्या आणि हिंस्र जगात अनोळखी व्यक्तींमध्ये स्वतःचं ‘घर’  सापडलेल्या व्यक्तींचा हा एकत्रित प्रवास होता.

घर म्हणजे छत, भिंती आणि खांब. डोक्यावरचं छत जरी सुरक्षा देत असलं, तरी भिंती आणि खांब, या  सपोर्ट सिस्टीममुळे छत त्याच्या जागी खंबीर राहतं. 

आपल्याला आयुष्यात येणारया वादळवाऱ्यांपासून सुरक्षा हवी तर आपल्या जीवनात मनुष्यरुपी खांब, भिंती म्हणजे ‘सपोर्ट सिस्टीम’ ही तेवढीच खंबीर हवी. आपल्या डोक्यावरचं कधी छप्पर उडालं की आपल्याला निवारा देणारी माणसे हवीत. आपण व्हर्चुअल जगात असणाऱ्या फॉलोवर्स, फ्रेंड्स च्या आकड्यांवरून आपलं गणगोत ठरवत असू, तर आपण चुकतोय,असं ते जर्नल सर्जन यांचे मत होतं.  आपल्या आयुष्याची खरी सफलता, आपल्या आयुष्यात असणाऱ्या त्या मोजक्या लोकांमुळे ठरते, जे एका मध्यरात्री केलेल्या फोन कॉल मुळे स्वतःची झोप मोडून आपल्या मदतीसाठी धावत येतात.

आपण चुकल्यावर ,आपल्याला दोन बोल कमीजास्त सुनावून आपली चूक सुधारण्यासाठी मार्ग सुचवतात आणि म्हणतात “खबरदार ! पुन्हा असा चुकलास तर याद राख.”

ज्यांच्याशी वर्षांचा अबोला असला तरी आपल्या आयुष्यातली सुखद अथवा दुःखद घटना घडल्यावर त्यांना सांगण्यासाठी आपला फोनकडे हात वळतो, ज्यांच्यावर किती जरी राग असला तरी आयुष्याने आपल्या श्रीमुखात भडकवली, की जो बर्फाप्रमाणे वितळून जातो,

जे स्वतःच्या आयुष्यात कधी कमी पडले असतील कधी, पण तुम्हाला गरज पडली म्हणून, आपल्या गरजांना मुरड घालून तुमच्या पाठीशी खंबीर उभे राहतात,

— अशा लोकांना कधीच कोणत्याही परिस्थितीत, आपल्या आयुष्यातून जाऊ देऊ नका.

 या खंबीर सपोर्ट सिस्टिम मुळेच, अनेक वादळं आली तरी आपण ठामपणे उभे राहू शकतो.

 हे ‘सपोर्ट सिस्टीम’ नात्यात सापडतीलच असं नाही, जिथे सापडेल तिथे त्यांना आपण मात्र घट्ट धरून उभं राहावं.

© डॉ. प्राप्ती गुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जास्वंदीच्या कळ्या ! ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆

?  मनमंजुषेतून ? 

☆ 🥀 जास्वंदीच्या कळ्या ! ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆

जास्वंद : “अगं, मी वीतभर असताना, मला किती प्रेमाने लावलं होतस तुझ्या अंगणात. तुझ्या बाळांप्रमाणे तू माझी काळजी घेतलीस. अजूनही घेतेस…आता  माझं वय दोन वर्षे असेल ना? माझी मुळं मातीत घट्ट रुजेपर्यन्त तुझ्या प्रेमळ स्पर्शाने मी आनंदी होत होते. आणि मनाची खात्री झाली की, ही मला छान घडवणार!रोज पाणी घालण, वरचेवर माती बदलणं,  तू घरी केलेलं खत घालण, माझ्या फुटलेल्या कोवळ्या पालवीवर धुळ जरी पडली तरीही कससं होणारी तू, माझ्या आजूबाजूला किडही लागू देत नव्हतीस. 

नव्या उमेदीने मला एकेक फांदी नवीन फुटत गेली, मी बहरत गेले. कधीतरी एखादी कळी जणू त्या एकसारख्या कापलेल्या पानातून वर डोकवायची! दोन-तीन दिवसात फुलायची! लालभडक ….पहिलं फुल देवाला घातलंस. आता माझा विस्तार आणि वंशावळ वाढलीय! हळूहळू करत लहान मोठ्या भरपूर कळ्या वर डोकावू लागल्या. आपलं आकाश शोधू लागल्या!

तुझ्या मुलीला तारुण्याच्या उंबरठ्यावर नाजूक उपदेश देताना पाहिलय मी! माझ्या अपत्यानाही  मी हलकेच गोंजारत तसे उपदेश देऊ लागले. कोवळ्या कळ्यांच्या वरील आवरणाच्या हिरवळीतून हलकेच उठून दिसणारा त्यांचा आतला लालसर रंग! त्या कळीच सौंदर्य अधिकच वाढवत असे. कळीच फुल होतानाच तीच सौन्दर्य आणि टप्पे काय वर्णू! मला वाटत होतं माझीच दृष्ट लागेल की काय ह्या माझ्याच बाळांना. 

लालभडक फुलं हसताना…मी समाधानी होत असे ! खूप फुलं फुलू लागली…लाल पताक्यांसारखी उंच हलु लागली आणि आपलं अस्तित्व ठळकपणे दाखवू लागली. 

अशातच…तू एकदा पाहिलंस, शेजारच्या,रस्त्यावरच्या येणाऱ्या जाणाऱ्यांनी लाल फुल तोडायला सुरुवात केली. तुला कसतरी वाटायचं.. इतकं देखणं झाड आपलं आहे, फक्त आपलं आणि इतर लोकं याची फुल तोडतात. पण तू एकदा माझ्याशी गप्पा मारताना हे बोलून दाखवलस आणि मला आणि स्वतःलाही समजावलस की आपला काय आणि लोकांचा काय… देव एकच! त्या देवाच्याच चरणी जातील ही फुल! ह्या विचाराने तू थोडी शांत झालीस आणि मीही.

पण तुला सांगावं की नाही? न राहवून सांगते आता…आताशा, आजूबाजूचे लोक, रस्त्यावरचे लोक कळ्याच काढून न्हेत आहेत. अगदी ओरबाडून, काठीला आकडा लावून, उड्या मारून फांद्या तोडून मुक्या कळ्या तोडत आहेत ग. माझ्याच न फुललेल्या बाळांची ही अवस्था…लोक जवळ आले तरी पोटात गोळा येतो आता…माझ्यापासून माझ्या तारुण्याचा उंबरठा ओलांडत असलेल्या माझ्या पोटच्या कळ्यांची ही अवस्था बघवत नाही मला…त्यांचा रंग आता कुठे खुलणार असतो…त्यांना पूर्ण आकारणार  असतात…पण, त्यांच्या अवयवांचा रेखीवपणा आहे त्या अवस्थेत ओरबाडून घेऊन, स्वतःच्या घरात नेऊन ठेऊन, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी देवाला वाहण्यात काय आनंद मिळतो त्यांना ? आणि कोणत्याही देवाला हे आवडेल का? एकीकडे म्हणतात, निसर्ग ही देवता आहे म्हणतात ना, मग आम्हाला त्रास देऊन ते स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त देवाच नाव घेऊन समाधान का मानतात? आमचं समाधान त्यांनी जाणलेय कधी?

माझं रडू, माझं रक्त नाही दिसत त्यांना…माझ्या भावना नाही समजू शकत ते…आईपासून त्यांना अकाली पोरकं करणं…संवेदनाहीन झालीत का ही माणसं?

पोटच्या गोळ्याला गर्भातच खुडणारी माणसं ऐकली होती.. अत्याचार करून ‘ती’ ला संपवणारी माणसं ऐकली होती. पण आता आमच्याही तरुण कलीका अशा खुडून, त्यांच्यावर अत्याचार करून, त्यांचं जगणं संपवणारे..रांगोळ्या घालण्यासाठी एकेक पाकळी वेगळी करणारे…आम्हाला ओरबडणारे…तुम्ही ‘नराधम’ म्हणता तुमच्या भाषेत अशा लोकांना,  मी काय म्हणू?

सगळेच तुझ्यासारखे दुसऱ्याचं काळीज जाणारे नसतात ग! “

मी : पाणावल्या डोळ्यांनी निशब्द…

© सौ अश्विनी कुलकर्णी

सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘समाजासाठी काहीतरी…’ ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

? मनमंजुषेतून ?

☆ ‘समाजासाठी काहीतरी…’ ☆ सुश्री त्रिशला शहा 

समाजात सध्या अतिशय चर्चेत असलेला विषय म्हणजे अयोध्यामधील राममुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा.या सोहळ्यानिमित्त अनेक राजकीय लोकांनी आपापल्या भागात मंदिराची तात्पुरत्या स्वरुपाची प्रतिक्रुती बनवून कोट्यावधी रुपये खर्च केले.पण याचवेळी एका लहान गावात मुस्लिम समाजाच्या उर्दू शाळेसाठी स्वखर्चाने इमारत बांधून गावच्या सरपंचाने  हिंदू मुस्लिम ऐक्य साधून समाजापुढे आदर्श ठेवला.

ही घटना आहे,कर्नाटकातील जमखंडी तालुक्यातील गलगली या लहान गावातील.गलगली या गावी माझ्या बहिणीच्या मुलीचे,तनुजाचे सासर आहे.तनुजाचे पती श्री. राहुलकुमार गुजर म्हणजेच आमच्या घरचे जावयी.स्वतःची शेती,आँटोमोबाईलचे दुकान आणि गावचे सरपंचपद सांभाळून समाजासाठी सतत काहीतरी करत रहाण्याची त्यांची मनोवृत्ती.गावातील कौटुंबिक कलह मिटवणे, लग्न जमवणे,शिक्षणासाठी गरजू मुलांना मदत करणे,गावात काही सुधारणा करणे अशी कामे ते नेहमीच करत असतात.

कोरोना काळात 2020 मध्ये अचानक लाँकडाऊन झाले त्याआधी दोन दिवस काही घरगुती कामानिमित्त राहुल आपल्या आईसमवेत दौंड,जि. पुणे येथे आपल्या बहिणीकडे गेले होते,दोन दिवसांनी अचानक लाँकडाऊन चालू झाले आणि ते तिथेच अडकून राहिले.परतीचा मार्गच बंद झाला.त्यातून महाराष्ट्रातून कर्नाटक मध्ये जाण्यासाठी परवानगी मिळत नव्हती. एक महिन्याने बऱ्याच प्रयत्नातून गावी यायला परवानगी मिळाली पण गावात आल्यावर त्यांना सात दिवस क्वारंटाईन म्हणून गलगली येथील एका उर्दू शाळेत रहावे लागले.या सात दिवसाच्या वास्तव्यात शाळेची दुरावस्था राहुल यांच्या लक्षात आली.त्यातच याकाळात त्यांना मुस्लीम समाजाकडून अतिशय मोलाचे सहकार्य ही मिळाले.यातूनच या शाळेसाठी आपण काहीतरी केले पाहिजे असा विचार राहुल यांच्या मनी आला.पुढे कोरोना संपल्यानंतर या शाळेचे बांधकाम आपण स्वखर्चाने करण्याचे त्यांनी ठरविले.त्यासाठी शाळेतील शिक्षकांशी चर्चा करुन त्यांनी हा विषय मांडला आणि कामाला सुरवात करण्यास सांगितले. आर्थिक बाजू मी सांभाळेन असे आश्वासन ही दिले. त्याप्रमाणे या शाळेचे बांधकाम चालू झाले. काम अंतिम टप्प्यात आले असतानाच राहुलना अपघात होऊन तीन महिने सक्तीची विश्रांती घ्यायला लागली.त्यामुळे कामात थोडा खंड पडला. शारीरिक द्रुष्ट्या व्यवस्थित झाल्यावर काम परत जोमाने सुरु झाले आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात काम पुर्ण झाले. शाळेच्या या सुंदर वास्तुचा लोकार्पण सोहळा 26  जानेवारी 2024 रोजी उत्साहात साजरा केला गेला. गावातील सर्व मुस्लिम बांधवांनी अतिशय क्रुतज्ञतेने राहुलकुमार यांचा गौरव केलाच शिवाय त्यांच्या आईंचाही सन्मान त्यांच्या घरी जाऊन केला.

विशेष म्हणजे चांगले काम करीत असताना कुणीही मोडत घालू नये आणि ते व्यवस्थित पार पडावे म्हणूनच की काय या समाजोपयोगी कामाची वाच्यता काम पुर्ण होईपर्यंत राहुलकुमारनी कुठेही केली नाही,अगदी आपल्या आई व पत्नीलाही याबद्दल सांगितले नव्हते.10 वर्षांपूर्वी राहुल यांच्या पिताजींचे निधन झाले,त्यांची स्मृती म्हणून शिक्षकांनी त्यांचे नाव शाळेला दिले.कोरोना काळात हरवलेल्या माणुसकीचे दर्शन हिंदू- मुस्लिम एकतेतून घडले.

© सुश्री त्रिशला शहा

मिरज 

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ व्हाट्सअप… वरदान की शाप ☆ -सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? मनमंजुषेतून ?

व्हाट्सअप… वरदान की शाप ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

व्हाट्सअँप हा प्रकार जितका उपयुक्त आहे तितकाच कंटाळवाणा सुद्धा आहे.

व्हाट्सअँपमुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात.पण तितकच काही चुकीचे ज्ञान पण खात्रीपूर्वक खरे असल्यासारखे

बोकाळते, पसरते.लोक शहानिशा केल्याशिवाय फॉरवर्ड करतात.आणि करणारी लोक आपल्या  विश्वासाची असल्यामुळे त्या गोष्टींवर  विश्वास ठेवायचा की नाही ह्याबद्दल मन सांशक होते.

ग्रुपवर एखाद्याचा वाढदिवस असला की पूर्ण दिवस सदिच्छांचा भडीमार,केक्स फुलांचे गुच्छ वगैरे चे फोटो अगदी रात्री १२ वाजल्यापासून पाठवायची चढाओढ.सगळ्यांनी पाठवले आणि आपले पाठवायचे राहून गेले तर!

बरं वाढदिवसाचे एकवेळ ठीक त्या व्यक्ती पर्यंत पोहोचून तिला त्यामुळे आनंद मिळेल पण कोणाचे निधन झाले की श्रद्धांजली,rip ची लाईनच लागते.आता सांगा श्रद्धांजली त्या व्यक्तीला समजणार का?आपले समाधान.एरवी ती व्यक्ती जिवंत असताना तिला भेटले असते तर  तिच्या बरोबर दोन घटका वेळ घालवला  असता तर तिला किती समाधान मिळाले असते?जर ती व्यक्ती आजारी असताना तिची विचारपूस केली असती शक्य झाल्यास सेवा केली असती तर खरं.गेल्यावर श्रद्धांजलीचा देखावा कशाला आणि कोणासाठी?

तसेच सकाळी उठल्यावर गुड मॉर्निंग,रात्री गुड नाईट ती फुले,निसर्ग त्यांचे फोटो कशाला ?जसं काही गुड मॉर्निंग गुड नाईट विश नाही केले तर त्याची सकाळ, रात्र चांगली जाणार नाही.पण ह्या सदिच्छामुळे मोबाईल जाम होतो.पुढील जरुरीचे मेसेज,फोटो यायला रोड जाम होतो.मग सगळे डिलिट करा.

देवाधिकांचे फोटो,त्याचा तर भडीमार.परत डिलिट करायला जिवावर येत.पण नाईलाज 

काही लोकं ह्या जपाची साखळी करा.१०लोकांना पाठवा वगैरे पाठवतात  त्याच्यात पण काही अर्थ नसतो.पण समोरच्याला धर्मसंकट.पुढे साखळी चालू नाही ठेवली तरी पंचाईत पाठवयाचे तर मनाला पटत नाही.

गुड मॉर्निंग,गुड नाईट ह्या मेसेजचा उपयोग एकटी व्यक्ती राहात असेल तर तिची खुशाली रोजच्यारोज इतर नातेवाईकांना समजायला उपयोग होतो.ज्या दिवशी गुड मॉर्निंग मेसेज आला नाही म्हणजे त्या व्यक्तीला काही प्रॉब्लेम आहे हे समजून त्याच्या मदतीला जाऊ शकतो.हा व्हाट्सअँपचा मोठा उपयोग आहे.

एखाद्या ठिकाणी लग्न ,मुंजी सारखा प्रसंग आहे एखादी व्यक्ती हजर राहू शकत नाही तर जगभरातून विडिओ कॉल करुन पाहू शकते .जणू काही ती व्यक्ती तिकडे हजर आहे आणि कार्याचा लाभ घेऊ शकते.मुलगा मुलगी जगभर कुठेही असली तरी आई वडिलांना विडिओ कॉल करुन भेटू शकतात.

वर्क फ्रॉम होम करुन करोनाच्या काळात,भरपूर पाऊस असताना घरबसल्या माणसे कामे करू शकली.मुले शाळेत न जाता घरच्या अभ्यास करू शकली.

व्हाट्सअँपचा एक मोठा फायदा ज्या व्यक्तीला ऐकू कमी येते कानाचा प्रॉब्लेम असतो ती व्यक्ती

व्हाट्सअँप वर वाचून,लिहून आपला वेळ आनंदात घालवू शकते बाहेरच्या नातेवाईकांशी मनमोकळे पणांनी टाईप करुन.संपर्कात राहू शकते.

एखाद्या फक्शनचे आमंत्रण एकाच वेळी सगळ्यांना देऊ शकतो.कार्ड काढा त्यावर पत्ते लिहा कॉरिअरने पाठवा तो खर्च,वेळ वाचतो.अपव्यय होत नाही.

शेवटी काय प्रत्येक नाण्याला दोन बाजू  फायदा,त्याच्या बरोबर तोटा हा असणारच.कसा आणि किती त्या व्हाट्सअपचा उपयोग करुन घ्यायचा हे ज्याचं त्यांनी ठरवायचं.

© सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संघर्षातून यशाकडे… ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

? मनमंजुषेतून ?

☆ संघर्षातून यशाकडे… ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆ 

मोबाईल शाप की वरदान हा ऐरणीवरचा प्रश्न आहे. अतिरेक झाला तर तो शाप ठरतो .पण सदूपयोग केला तर ते वरदानच असतं. नाशिकचे माजी सैनिक श्री. मेघश्याम सोनवणे सर, ह्यांच्या उत्तम उपक्रमाच्या कथा -विश्वात माझं पाऊल पडलं आणि व्हाट्सअपतर्फे अनेक हितचिंतकांच्या  ओळखी झाल्या. माणसे जोडण्याच्या छंदाला बळकटी आली. आणि माझ्यासाठी मोबाईल वरदानच ठरलं. माझ्या धाकट्या मुलानी  चि.प्रसादनी   मला  वाढदिवसाचा मोबाईल भेट दिला आणि माझ्यापुढे एक नवीन विश्व उभ केलं. ह्या विश्वात खूप चांगली माणसं मला भेटली.आणि मैत्रीचं नातं घट्ट झालं .

त्यातूनच भेट झाली रमेश साळुंखेची. माझ्या कथांवर त्याचं अभिप्रायाचं,प्रतिक्रियांचं आदान-प्रदान झालं. आणि एक दिवस त्याचा फोन आला ” ताई मला तुमच्याशी मोकळेपणी बोलावसं वाटतंय .तुम्ही बोलाल का माझ्याशी?” शब्दातला प्रामाणिकपणा, वाक्यातलं   आर्जव  आणि आवाजातलं मार्दव मनाला भिडल.कां कोण जाणे मनांत आलं काहीतरी संघर्षमय आहे, ह्या वयानी लहान असलेल्या  मुलांत . अशा ह्या आशावादी विचारांनी सम्राट असलेल्या तरुणाची आत्मकथा नक्कीच आदर्शवादी असेल असं मला वाटलं मी म्हणाले “रमेश अगदी खुल्या दिल्याने बोल.काही प्रॉब्लेम आहे का तुला?त्या स्वाभिमानी तरुणाचं रमेशचं  लगेच उत्तर आलं, ” नाही ताई प्रॉब्लेम होता. पण परमेश्वर, माझी आई सुभद्राई, माझे बाबा शिवाजीराव, माझे बंधू विक्रम आणि हितचिंतक यांच्यामुळे मी संघर्षाच्या परीक्षेत पास झालो.”  

त्याच्या बोलण्याने माझी उत्कंठा  शिगेला पोहोचली. आणि मी विचारलं, “आयुष्याच्या कुठल्या परीक्षेत  तु पास झालास? सविस्तर आणि खुल्या दिल्याने सांगशील का मला तु तुझी कहाणी ?   तुझा आदर्श मी नक्कीच जगापुढे मांडीन. मग निराश  तरुणांनाही  आशेचा किरण सापडेल. आणि तुझ्यामुळे त्यांना स्फूर्ती  मिळेल “…..  रमेशच्या आवाजात मोकळेपणा आला. त्याची कहाणी ऐकून मी  स्तंभित  झाले. परिस्थितीशी लढण्याचे सामर्थ्य ह्या इतक्या लहान वयातल्या मुलामध्ये आलं कुठून ? त्यानीच सांगितलेली त्याची ही कहाणी काळजाला हात घालणारी आहे.

ता. खटाव जि.सातारा गिरीजाशंकरवाडी येथे रमेशचं बालपण गेलं. बालपण कसलं !  हसा खेळायच्या दिवसातच त्याला लढाई द्यावी लागली . कारण तो म्हणाला,” मी अपंग आहे “ 

खटाव तालुक्यातील पश्चिमेकडच शेवटच्या डोंगर माथ्यावर वसलेलं गांव म्हणजे रमेशचं जन्मगांव. चौथीपर्यंतचं शिक्षण गावातच झालं.  वडील शिवाजीराव त्याचे  सारथी झाले. दैवाला दोष न देता रमेशच्या आई-वडिलांनी हे अवघड शिवधनुष्य पेललं.   शिवाजीरावांनी आणि त्या माऊलीने परिस्थितीवर मात करून आपल्या बाळाला वाढवलं. वडील रोज खांद्यावर बसवून आपल्या लेकराला शाळेत पोहोचवायचे. परिस्थितीशी सामना करण्याचं आयुष्याच्या शाळेतलं असे हे प्राथमिक शिक्षण घरातूनच रमेशला मिळालं होत. त्याच्या ह्या घरच्या  गुरूंना सादर प्रणाम.

रमेश पुढे म्हणाला,” मी चौथी पास झालो  खरा.,पण आता पुढे काय? पुढचं शिक्षण कसं घ्यायचं? हायस्कूल सहा कि. मी. लांब. रोज डोंगरावरून उतरून खाली  यायचं. पुन्हा डोंगर चढून घरचा परतीच्या प्रवास . पण तो करणार कसा? अक्राळ विक्राळ प्रश्नचिन्ह आ वासून समोर उभं होतं. शिक्षणाला पूर्णविराम द्यायची वेळ आली .. “ पण हा वाघाचा बच्चा लहान असूनही डगमगला नाही. मनात एकच विचार  शिक्षणाशिवाय आपल्याला गती नाही. आता थांबणे नाही. रमेशला त्रास होऊ नये म्हणून घरचे  कासाविस होऊन  त्याला विरोध करीत होते. पण म्हणतात ना, ‘आंधळ्याच्या गाई देव राखतो ‘ अगदी खरं आहे हे. कारण गावात सकाळी सातला दुधाची गाडी यायची . गाडीतली माणसं देवासारखी  मदतीला धावली. आणि त्यांच्या मदतीने रमेशचा हायस्कूल  प्रवास सुरू झाला.  रमेशच्या विस्तृत विचारांची कक्षा पाहून मी डोळे  विस्फारले.   

तो म्हणाला ” मला अपंगावर  मात करून पुढे जायचं होतं. त्यासाठी मनातल्या आशेची पावलं पुढे आणि पुढेच पडत होती. आई-वडिलांनी व इतरांनी पण खूप केलं माझ्यासाठी.  त्यांना त्रास न देता मला स्वावलंबनाचा मार्ग शोधायचा होता.  प्रयत्नांच्या अंतापर्यंतचा  आणि मनाच्या गाभाऱ्यात वसलेला परमेश्वर,मला प्रेरणा देत होता. आणि म्हणत होता ‘मी आहे  ना तुझ्या पाठीशी ! मी चालवीन तुला, आणि तुझ्या जिद्दीला, पुढे अन पुढे जाण्यासाठी.” आणि ह्या जिद्दीने दहावी ते  B. A. मुक्तविद्यापीठातून रमेश पास झाला. आणि मग  काय त्याच्या आशेला धुमारेच फुटले की हो !

भूतकाळात  डोकावतांना रमेश सांगू लागला, ” हायस्कूलच्या गावी जाताना दूध गाडीच्या लोकांचे माझ्यावर खूप खूप उपकार झाले आहेत. सकाळी सात वाजता दूध गाडी यायची. ते लोक मला गाडीत बसवायचे.  हायस्कूलची वेळ तर ११ ते ५:३० होती. पण  बरं का,राधिका ताई   माझी शाळा  मात्र सकाळी सात ते रात्री साडेनऊ पर्यंत असायची. कारण सकाळी माझ्या गावाकडून मला आणणारी गाडी सातला सुटायची .आणि रात्री साडेनऊला परतायची. शाळा सुटल्यावर संध्याकाळी साडेपाच ते साडेनऊ पर्यंत मी गाडीची प्रतीक्षा कऱीत बसून राहायचो. वाचन, होमवर्क, नोट्स काढणे यात वेळ  काढायचो. बसचा आवाज आला रे आला की आवराआवरीची धांदल उडायची माझी.” रमेश ची मिस्कील वृत्ती मला आवडली.

सत्कर्म करणाऱ्याला सत्पुरुष भेटतातच. माणसं मदतीला धावायची आणि बसमध्ये बसवायची. फार मोठ्ठ शिवधनुष्य पेललंय त्यानी. आणि तो दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला. पुढील शिक्षणाची मशाल त्याच्या मनात धगधगत होतीच. पण आता तर पुढे आणखी खरी सत्वपरीक्षा होती. पुढची पायरी गाठण्यासाठी  25 की. मी.कराड गावी जाणं भाग होतं. हा तर मोठा संघर्ष ! पण डोंगराएवढे आव्हान त्याला तिळाएवढं वाटलं. ‘कुणालाही त्रास न देता आयुष्य जगायचय मला.  आनंदाने आहे त्या परिस्थितीत आनंद मानूनच जगायचं’  हे सूत्र, आणि ही उमेदच त्याचं अंतिम ध्येय होतं.आणि आजही आहे .आणि ते त्यानी जिद्दीने चिकाटीने गाठलं. 

आज रमेश साळुंखे, महाराष्ट्रात एकमेव असलेल्या अशा शास्त्रीय महाविद्यालयात कराड कॉलेजमध्ये नोकरीला आहे. गेली आठ वर्षे प्रामाणिकपणे तो आपली ड्युटी बजावतोय. .   कुठल्याही परिस्थितीत समाधान मानण्याचे बाळकडू आई-वडिलांनी त्याला लहानपणीच पाजलय. आणि आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचं कसब रमेशच्याही अंगात आहे. ह्याचे सगळे श्रेय, वडील शिवाजीराव आणि आई सुभद्रा यांनाच तो देतो. सुभद्रा नाव ऐकल्यावर, मला  महाभारतातील अर्जुन पत्नी व श्रीकृष्ण भगिनी,सुभद्रा आठवली. तिचा पुत्र अभिमन्यू चक्रव्यूहविद्या आईच्या गर्भातच शिकला. तसंच ह्या सुभद्रापुत्राने संघर्षातून उत्कर्ष गाठण्याची कला आईकडून, जन्माआधीच शिकून घेतली असावी नाही का? 

भावनाप्रधान रमेश म्हणतो, ” मला अभिमान नक्कीच आहे की, असे आई-वडील मला लाभले.. माझे ध्येय गाठण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वराने आपले पाय आणि मदतीचे हात मला पुरवलेत. रमेश गर्वाने सांगतोय, “आज मी घडलो आहे ते माझ्या घरच्यांमुळेच माझे वडील श्री शिवाजीराव  माझी आई सौ.सुभद्रा आणि भाऊ विक्रम यांचा माझ्या यशात सिंहाचा वाटा आहे. त्यांनी मला वाढवलं. पुढील शिक्षणाचा त्यांचा नकार मायेपोटी  होता. मला त्रास होऊ नये म्हणून त्यांची तडफड,आणि माझ्यामुळे त्यांना म्हातारपणी त्रास होऊ नये म्हणून माझी धडपड.. या मायेतूनच मला प्रेरणा मिळाली. आणि आज मी इथपर्यंत येऊन पोहोचलो. त्यांच्यापुढे मी कायम नतमस्तक आहे, आयुष्याच्या या लढाईत अनेक हितचिंतक मला मिळाले. त्यांचे आभार . जीवाला जीव देणारे  परममित्र श्री.गोरख रा, थोरवे, श्री सचिन भि.शेडगे ,आणि सागर भि शेडगे यांच्यासारखे अजूनही साथ देणारे जिवलग मित्र मला लाभले, या सगळ्यांच्या मी कायम ऋणात आहे.”

रमेश मनापासून बोलत होता.

तर मंडळी अशी आहे ही खंबीर  रमेश साळुंखे याची कथा. तुमच्या दृष्टीनेही ती स्फूर्तीदायक ठरेल.अशी आशा आहे.  सांगायला मला अतिशय आनंद वाटतोय की, रमेशने यशाची परिसीमा आणि सुखाचा कळस गाठलाय . कारण त्याच्या आयुष्यात एका सौ.तेजस्वी नावाच्या गुणी मुलीने प्रवेश केला आहे.अर्थात                16 – 2 -2023  या शुभ दिनी त्याचे शुभमंगल झाले आहे .

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे.  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ साक्षात्कार… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

☆ साक्षात्कार… ☆ श्री मकरंद पिंपुटकर

मी आणि बायको, आमच्या अनुक्रमे ५ आणि ३ वर्ष वयाच्या लेकरांना घेऊन, सामानाने गच्च भरलेली ट्रॉली ढकलत तेवढ्याच गच्च भरलेल्या मॉलमध्ये बिलिंग काऊंटरकडे मार्गक्रमण करत होतो, आणि ते मगाचचे आजोबा परत आमच्याशी बोलायला आले होते.

तशी आजच्या संध्याकाळची सुरुवात काही फारशी चांगली झाली नव्हती. 

आज शुक्रवार होता. दिवसभर ऑफिसमध्ये काम करताना लोकांच्या डोळ्यासमोर संध्याकाळी सुरू होणाऱ्या वीकएंडची रम्य दृश्यं तरळत होती, मला मात्र सोमवारी एक अर्जंट प्रेझेन्टेशन होतं, घरी गेल्यावरही तेच काम घेऊन बसायला लागणार होतं हे जाणवत होतं. मुलांना मॉलमध्ये नेण्याचं प्रॉमिस केलं होतं, पण त्यांना काहीतरी थाप मारून टाळायचं, हेही ठरवलं होतं.  

पण घरी पोचलो आणि कळलं की माझ्या सासूबाईंची प्रकृती थोडी बिघडली होती, nothing serious, पण त्या आणि माझे सासरे उद्या इथे आमच्या घरी येणार होत्या. त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना दाखवणं, तपासण्या करून घेणं अशी कामं होती.

सासू सासरे येणार म्हणून आणि बाकीचीही वाणसामान आदि खरेदी होती, बायकोला एकटीला ते सगळं सामान आणणं जमलं नसतं. त्यामुळे न सुटके मला आल्यापावली परत बाहेर पडावं लागलं. या घटनेला दोन तास होऊन गेले होते, आणि आत्ता आम्ही खरेदी संपवून मॉलमधून निघण्याच्या मार्गावर होतो. 

आमची खरेदी चालू असताना एक t shirt, बर्म्युडा घातलेले मॉडर्न आजोबा लेकरांना बघून आमच्याजवळ आले. त्यांची नातवंडं अमेरिकेत असतात, या दोघांना बघून त्यांना त्यांची आठवण आली, म्हणून ते आवर्जून या दोघांशी गप्पा मारायला आले. 

आज आमच्या मुलांचा सौजन्य-सप्ताह चालू होता बहुतेक. या नव्या आजोबांशी त्या दोघांनी छान गप्पा मारल्या, त्यांच्याबरोबर हसले – खेळले, enjoy केलं. मुलांना टाटा करून आजोबा त्यांच्या खरेदीला निघून गेले. 

आणि आत्ता आम्ही निघत असताना ते परत आले होते. 

” यंग मॅन, हे सोनेरी दिवस पुन्हा येणार नाहीत,” ते माझ्याशी बोलत होते, ” मला कल्पना आहे की तुमच्या करीअरच्या दृष्टीने ही महत्त्वाची वर्षे आहेत, खूप कामं असतील, पण या लेकरांची ही वयं पुन्हा गवसणार नाहीत. मी पण कॉर्पोरेट कल्चरमध्ये काम केलं आहे, ती धावपळ – ती रॅट रेस काय असते हे मीही अनुभवलं आहे….. एकदा माझ्या मुलीला तिच्या बाहुल्यांसाठी डॉल हाऊस बनवायचं होतं. शाळेचा प्रोजेक्ट वगैरे नव्हता, तिलाच तिच्यासाठी हे करायचं होतं. मला नेहमीप्रमाणे काहीतरी deadline होतीच. 

तिनं माझ्याकडे डॉल हाऊस करायला मदत करायचा हट्ट धरला. माझ्या कामाच्या व्यापात आणि घाई गडबडीत मी तिला ठाम नकार दिला, आत्ता काही अर्जंट नाहीये, नंतर करू, मी बिझी आहे वगैरे सांगितलं आणि जायला निघालो…. निघालो खरा, पण तिचा तो बिच्चारा चेहरा नजरेसमोरून हलेना. काहीतरी तुटलं आतमध्ये. आणि मी परत फिरलो…. तास दोन तासांचंच काम होतं, डॉल हाऊस पूर्ण झालं. त्याक्षणीचा तिचा तो उत्फुल्ल चेहरा आजही आठवतो. त्या दिवशी काय deadline होती, ते आठवतही नाही, पण ते डॉल हाऊस आता माझ्या मुलीच्या मुलीकडे अजूनही थाटात दिमाखात उभं आहे…. लक्षात ठेव, म्हातारपणी – निवृत्तीनंतर, ऑफिसचं अमुक काम करायचं राहिलं, तमुक काम करायचं राहिलं ही रुखरुख नसेल, पण लेकरांचं बालपण निसटून गेलं ही रुखरुख मात्र नक्की असेल.”

आजोबा निघून गेले, बायको माझ्याकडे सहेतुक पहात होती.

भगवान बुद्धांना पिंपळाच्या झाडाखाली साक्षात्कार झाला, मला गच्च भरलेल्या मॉलमध्ये, गच्च भरलेली ट्रॉली ढकलताना साक्षात्कार झाला. मी काय गमावून बसणार होतो हे ध्यानात आलं. तसं होऊ देता कामा नये हा पक्का निर्धार झाला. आणि मुलांचे हात हातात धरून त्याच निर्धाराने मी पुढे निघालो.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी फसले, पण तुम्ही फसू नका… – लेखिका : सुश्री शर्वरी अभ्यंकर ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ मी फसले, पण तुम्ही फसू नका… – लेखिका : सुश्री शर्वरी अभ्यंकर ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

Scam *401

२ दिवसांपूर्वी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास मला एक काॅल आला. त्याने म्हटले की तो Blue Dart कंपनीतून बोलतोय, माझं एक कुरीयर आले आहे, deliver boy ला माझा address सापडत नाहीये आणि माझा फोनही लागत नाहीये. तर मी तुम्हाला delivery boy चा नंबर sms करतो, तुम्ही त्याला फोन करुन guide करा.

त्याने दिलेला नंबर होता *401 आणि मग(दहा आकडी नेहमीप्रमाणे मोबाईल नंबर, मी विचारले हे 401 काय आहे तर म्हणाला तो त्या delivery boy चा specific extension नंबर आहे, पुढचा नंबर कंपनीचा आहे. 

मला आलेली शंका माझ्या दुर्दैवाने मी बाजूला सारली आणि त्या नंबर वर काॅल केला, तर मला माझा नंबर divert केला जात आहे अशी टेप ऐकू आली आणि त्यानंतर एका तासातच माझे WhatsApp account, hack करण्यात आले. माझ्या नावाने माझ्या WhatsApp account वरुन अनेक लोकांना पैशाची मागणी करणारे मेसेज गेले, मला साधारण ४५ मिनिटांनी हा प्रकार कळला, तेवढ्या वेळात माझा फोन hacker च्या नंबरवर फिरवण्यात आल्या मुळे मला कुणाचेही काॅल येऊ शकले नाही. 

झाल्या प्रकरणामुळे प्रचंड मनस्ताप झाला , मला माझा नंबर तात्पुरता deactivate करावा लागला त्यानंतर पोलिस कंप्लेंट, नवीन SIM card अशी बरीच उस्तवार करावी लागली.

नशीब कोणी मी समजून hackers ला पैसे नाही पाठवले. 

हा माझ्यासाठी एक मोठ्ठा धडा होता आणि मला लागलेली ठेच अजून कोणाला लागू नये यासाठी हा पोस्ट प्रपंच.

मी यानंतर *401 या कोडबद्दल गुगल गुरुंकडून माहिती घेतली असता कळलं कि या कोड मुळे मी स्वतःच्या फोन ला hackers च्या नंबरवर divert करण्याची order दिली आणि मग त्याने फोन काॅल वरुन WhatsApp code घेउन माझं WhatsApp स्वतःच्या फोनवर घेतलं. आणि पुढचं रामायण धडलं.

मी याआधी Facebook वर बर्याच posts पाहिल्या होत्या ज्यात त्यांनी लिहिले होतं कि त्याचं account हॅक झालं आहे पण कसं झालं ते कोणीही लिहिले नव्हतं, जर या कोड बद्दल आधी माहिती असती तर बरं झालं असतं अर्थात हे उशीरा सुचलेले शहाणपण होतं तर कृपा करुन ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा आणि असल्या प्रकारांना बळी पडू नका. 

लेखिका : शर्वरी अभ्यंकर

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares