मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कथा संघर्षाची (काळोखातली प्रकाशवाट) – भाग – १ लेखक : श्री काशीनाथ महाजन ☆ प्रस्तुती – डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

??

कथा संघर्षाची (काळोखातली प्रकाशवाट) – भाग – १ लेखक : श्री काशीनाथ महाजन ☆ प्रस्तुती – डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात पातोंडे गाव आहे, तेथे देवराम महाजन हे अतिशय गरीब मिल मजूर राहत होते. नऊ जणांचे कुटुंब चालवणे त्यांना अतिशय अवघड जात होते. मी त्यांचा मुलगा म्हणजे काशिनाथ देवराम महाजन. माझे  प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत झाले. हुशार मुलगा म्हणून शाळेत व घरी माझे कौतुक व्हायचे. 

इयत्ता चौथीत असतांना शासकिय विद्यानिकेतन साठी स्पर्धा परीक्षा नव्यानेच सुरू झाली होती. ह्या परीक्षेचे वैशिष्ट्य असे कि त्यात उत्तीर्ण झालेल्या मुलांपैकी सहा-सात जिल्ह्यातून फक्त तीसच मुलांची निवड केली जात असे . त्यांना शासकीय विद्यानिकेतनात प्रवेश मिळायचा. अशी विद्यानिकेतने महाराष्ट्रात फक्त चारच होती. माझा जळगाव जिल्हा तत्कालीन मुंबई विभागात असल्याने या विभागासाठी नाशिक येथे शासकीय विद्यानिकेतन होते. या परीक्षेत उत्तम गुण मिळाल्याने मला नाशिकच्या विद्यानिकेतनात प्रवेश मिळाला. शाळेतील शिक्षण, निवास, भोजन उच्च प्रतीचे होते. कला ,क्रीडा, संगीत व विविध छंद आत्मसात करण्यास येथे वाव होता. 

शासकीय विद्यानिकेतनात आपल्या मुलाला प्रवेश मिळाला याबद्दल देवराम महाजन यांना फारच आनंद झाला होता.गावात व आजूबाजूच्या परिसरात माझा व वडिलांचा सत्कार करण्यात आला होता. 

मी नव्या शाळेत खूपच उत्साहाने अभ्यास करू लागलो. मला इयत्ता सहावीत असतांनाच पहिली कविता सुचली. तिच्या २ओळी प्रस्तुत करत आहे.

त्रिवार वंदन माझे, मधुकरराव चौधरींना

दगडांमधले रत्न शोधले ,त्या रत्नपारखींना

ती वाचून शाळेतील अध्यापकांना व प्राचार्यांना खूपच आनंद झाला. 

नियतीला मात्र माझे वैभव पाहवले नाही. माझी नजर हळूहळू कमी होऊ लागली. वयाच्या बाराव्या वर्षी मला लिहिणे वाचणे अशक्य झाले. तरीही प्राचार्यांनी माझे नाव शाळेतून कमी केले नाही. मुलांनी व अध्यापकांनी मला सहकार्य करावे असे त्यांनी सुचवले. वाचक व लेखनिकाच्या मदतीने माझे शिक्षण सुरू राहीले. 

माझे वडील मात्र मुलगा अंध झाल्यामुळे फारच खचून गेले. त्यातच ते जिथे काम करत होते ती मील बंद पडली. कमाईचे काहीच साधन राहीले नाही. त्यांच्या जीवाची खूपच घालमेल झाली. मी नववीत असतांनाच त्यांचे दुःखद निधन झाले. संसार उघडा पडला. तरी आईने धीर सोडला नाही. शेतमजुरी करून ती कसेबसे दोन घास मुलांच्या मुखी घालू लागली. 

मी अंध झालो तरीही कविता करणे सोडले नाही. जो निसर्ग मनात साठला होता त्या आधारे निसर्ग कविता करणे सुरूच होते. त्याबरोबरच देशभक्तिपर, वैचारिक व सामाजिक कविताही करू लागलो. शाळेतील साप्ताहिकात व वार्षिक विशेष अंकात माझ्या कवितांना मानाचे पान मिळू लागले. मी मनाशी ठरवले कि –

जीवनात आला अंधार

तरी सोडणार नाही निर्धार

कविताच देतील मला आधार

आणि दिव्य प्रेरणांचा साक्षात्कार 

अध्यापक आणि मित्रांच्या सहकार्यामुळे तसेच प्राचार्यांच्या माझ्यावरील कृपादृष्टी मुळे माझे अंधत्व मला फारसे त्रासदायक वाटले नाही. अभ्यास उत्तरोत्तर उत्तम होत गेला. त्यामुळेच तत्कालीन अकरावी म्हणजेच मॅट्रिक च्या परिक्षेत मला नेत्रदीपक यश मिळाले. २४ जून १९७३च्या ‘साप्ताहिक गावकरी’ या नाशिकच्या वर्तमानपत्रात ‘अधुरी ही कहाणी’ या शीर्षकाखाली माझ्या विषयी प्रदीर्घ लेख प्रकाशित झाला. 

शासकीय विद्यानिकेतनाची सुविधा ११ वी पर्यंतच असल्याने मला गावी परत यावे लागले. 

दुर्दैवाची गोष्ट अशी कि ‘दुष्काळात तेरावा महिना’ या म्हणीप्रमाणे १९७१ ते १९७३ अशी सलग तीन वर्षे भारतात भीषण दुष्काळ पडला होता. शेते ओसाड पडली होती. भारतातील अन्नसाठा संपला होता. अमेरिकेतून निकृष्ठ प्रकारची लाल ज्वारी आणि मका आयात करण्यात आला होता. जनतेच्या पोटाची जेमतेम व्यवस्था झाली होती. रोजगारासाठी पाझर तलावांचे खोदकाम सरकारने सुरू केले होते. 

मी अंध असूनही आईबरोबर पाझर तलावाच्या कामांना जात असे. मजूरी फक्त आठ आणे मिळायची. अनेकदा ठेच लागून पडायचो ;पण तसाच उठायचो . 

मला पुढे शिकायचे होते. गावापासून आठ किलोमीटर अंतर असलेल्या चाळीसगाव कॉलेजात प्रवेश मिळण्यासाठी मी धडपड सुरू केली. या कामात माझ्या काकांनी मला मदत केली. आजपावेतो त्या कॉलेजात कुणीही अंध शिकला नव्हता. अनेकदा विनंत्या करूनही तिथे प्रवेश मिळत नव्हता. मी मात्र प्रयत्न करणे सोडले नाही. अखेर प्रवेश मिळाला. कॉलेजला जाण्यासाठी गाडी भाडे देणे मला शक्य नव्हते. त्यामुळे मी रोज ८ किलोमीटर पायीच जाऊ लागलो. दरम्यानच्या काळात चाळीसगावच्या अंध शाळेत ब्रेल लिपीचे शिक्षण घेतले. त्यामुळे मला कॉलेजच्या नोट्स काढता येऊ लागल्या. खूप अभ्यास करू लागलो. १९७७ साली राज्यशास्त्र विषयात बी.ए . उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालो. त्या काळात अंधांना नोकरी मिळणे अवघड होते. मला कळले की पुण्याला अंधांसाठी एक शेल्टर वर्कशॉप आहे, तेथे अंध लोक खुर्च्या विणतात, खडू तयार करतात, ;त्यासाठी तेथे प्रशिक्षणाची सोय आहे, भोजन व निवास मोफत आहे, शिक्षणाची अट नाही. मी बी ए उत्तीर्ण असूनसुद्धा त्या वर्कशॉप मध्ये प्रवेश घेतला. 

१९७८ साली महाराष्ट्र शासनाने पदवीधर अंधांसाठी एक योजना सुरू केली होती. महाराष्ट्रातून दरवर्षी एका पदवीधर अंधास अंध शिक्षक प्रशिक्षणासाठी निवड पद्धतीने प्रवेश मिळणार होता. त्यावेळेस भारतात फक्त चारच प्रशिक्षण केंद्रे होती. गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश या तीन राज्यांसाठी मुंबई येथे प्रशिक्षण केंद्र होते. १९७८ साली अंध शिक्षक प्रशिक्षणासाठी माझी निवड झाली. या प्रशिक्षणात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यामुळे तत्कालीन गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांच्या शुभहस्ते मला ‘ मृणालिनी पिंगळे अॅवॉर्ड’ देण्यात आले. 

१९७९ साली शासकीय बहुउद्देशीय संमिश्र केंद्र सोलापूर येथे माझी विशेष शिक्षक पदावर नियुक्ती झाली. माझे काव्यलेखन अखंड चालूच होते. अनेक ब्रेल व डोळस वर्तमानपत्रे, मासिके यातून माझ्या कविता प्रकाशित होत होत्या. त्या शाळेतील  अंध मूकबधिर व अपंग मुलांना पाहून माझ्या मनात आले कि यांच्या जीवनात नवे चैतन्य निर्माण करावे. त्यासाठी छान छान गाणी रचावी. त्यांना सहज सोपी चाल लावावी. मुलांना माझी गाणी आवडली. 

‘नाते प्रगतीशी’ या माझ्या कवितेने सोलापूरमध्ये क्रांती घडवली.तिच्या दोन ओळी प्रस्तुत करत आहे.

विज्ञानाची संगत आम्हा, हेलन केलर पाठीशी

मनामनाला पटवून देऊ,नाते आमचे प्रगतीशी

अनेकवर्तमानपत्रांनी या कविते विषयी लेख लिहिले.सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी रत्नाकर गायकवाड यांनी या कवितेचे कौतुक केले. १९८१ हे साल जागतिक अपंग वर्ष म्हणून जाहीर झाले होते. गायकवाड साहेबांनी त्यानिमित्त अनेक उपक्रमात मला सहभागी करून घेतले होते. तत्कालीन शिक्षक आमदार प्रकाश एलगुलवार यांनी माझ्या सहकार्याने सोलापूर येथे राष्ट्रीय अंधजन मंडळाची जिल्हा शाखा स्थापन करून माझी नियुक्ती सरचिटणीस पदावर केली. 

अंध व्यक्तीचा विवाह होणे हे त्या काळात जवळजवळ अशक्य होते. अंधही  शासकीय नोकरी करतो हे कुणीही मान्य करत नव्हते. फार खटपट केल्यानंतर मामाच्या मुलीशी माझा विवाह झाला. 

 – क्रमशः भाग पहिला

लेखक : काशीनाथ महाजन

नाशिक 

फोन ९८६०३४३०१९

प्रस्तुती : डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दोन धागे रामासाठी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ दोन धागे रामासाठी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

“मुखी रामनाम गाऊ, मुखी रामनाम!” हे ऐकतच लहानाची मोठी झाले .गोंदवलेकर महाराजांनी रामनामाची उपासना सांगितली होती, ती आमच्या घरात चालू होतीच.. त्यामुळे घरातील वातावरणाचा मनावर प्रभाव असल्याने ‘जेथे राम, तेथे नाम’ अशी श्रद्धायुक्त भावनेने उपासना चालू आहे.

सध्या अवघ्या पुण्याला या रामवस्त्राने ऊब पांघरली आहे  असे म्हणायला हरकत नाही! डेक्कन जिमखान्यावरील फर्ग्युसन रोडला अनघा घैसास यांच्या “सौदामिनी” साडी सेंटर मध्ये राम वस्त्र विणण्याचे आयोजन केले आहे, असे कळल्यावर आपण तिथे जाऊन दोन धागे तरी विणू या असं मनानं ठरवलं होतं! दोन-तीन दिवस या विचारातच गेले. मग माझ्या दोन तरुण मैत्रिणी जान्हवी आणि योगिता यांच्याबरोबर मी ‘सौदामिनी’ दुकानात गेले. तेथील वातावरण पाहून मन भारावून गेले. त्या दिवशी फारशी गर्दी ही सकाळी नव्हती, त्यामुळे आम्हाला आरामात चार धागे विणण्याची, हात मागाजवळ स्वतःचा फोटो काढून घेण्याची, तसेच रामाच्या मूर्तीचा फोटो काढण्याची संधी मिळाली! मनाला खूप समाधान वाटले. त्यानंतर मात्र रोज राम धागा विणायला जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली. आणि त्या भाविक वातावरणाचे वस्त्र सर्वांच्या मनात विणले जाऊ लागले. ‘इतके काय आहे, तिथे बघूया तरी!’ या विचाराने माझ्या मिस्टरांनी मला तिथे जायचंय अशी इच्छा व्यक्त केली. मी काय एका पायावर तयार होते! रामसेवेत आणखी चार धागे विणायला मिळतील म्हणून! आम्ही सकाळी तिथे दहा वाजता पोहोचलो. आता पहिल्यापेक्षा गर्दी खूपच वाढली होती. रांग लावावी लागत होती.

तरीही ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी रांग असल्यामुळे आम्ही दोघे लवकरच आत गेलो.रामनामाचे धागे पुन्हा एकदा विणताना मन भरून आले..हे विणलेले वस्त्र आता अयोध्येला जाणार या कल्पनेने!

श्रीराम हे आपल्या देशाचे उपास्य दैवत आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही! राम आणि कृष्ण हे परमेश्वराची दोन्ही रूपे  आपल्यासाठी पूजनीय आहेत.ग. दि. माडगूळकरांच्या गीत रामायणातील वर्णनाने सुद्धा श्रीरामाची नगरी, अयोध्या आपल्या डोळ्यासमोर येते!” श्रीरामाच्या पूजेसाठी आज *अयोध्या सजली…..”हे गीत पुन्हा एकदा 22 जानेवारीला आपल्या ओठावर येणार आहे. श्रीरामांचा आदर्श कायमच आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. अयोध्याचा राजाराम, एक पत्नी व्रत असणारा राम, आपल्या माता-पित्याबद्दल आदर दाखवणारा राम, आपल्या बंधूंबद्दल प्रेम असणारा राम, सर्व प्रकारच्या  नात्यांना जोडणारा हा श्रीराम आपल्यासाठी आदर्श आहे!

रामभूमी मुक्त करून घेण्यासाठी खूप मोठा लढा हिंदूंना द्यावा लागला. पण आता खरोखरच ते रामराज्य थोड्याफार प्रमाणात आपल्याला दिसू लागले आहे.

दोन धागे रामासाठी विणायचे म्हंटल्यावर गेले काही दिवस हजारोंच्या संख्येने राम धागा विणण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. आपली रामा बद्दलची श्रद्धा येथे रामनामात गुंतली आहे. जी वस्त्रे अयोध्येला जाणार आहेत, त्याचा एक अंश भाग तरी आपल्या हातून विणला जावा , या श्रद्धेने येथे लोक येत आहेत. प्रत्येक जण दोन धागे विणतात, तिथं असणाऱ्या मूर्तीला श्रद्धेने नमस्कार करतात आणि कृतार्थ भावनेने परत जाताना म्हणतात,’ रामराया तुझ्या वस्त्राचे दोन धागे विणण्याचे भाग्य मला मिळाले, ही तुझी माझ्यावर तेवढी कृपा आहे! एका श्रध्देने  समाज एकत्र येतो. आपल्यातील एक विचार वाढीला लागतो, हे केवढे मोठे समाज मन जोडण्याचे काम या रामनामाच्या धाग्यांनी केले  आहे. या एकूणच संकल्पनेला माझा मनापासून नमस्कार ! *जय श्रीराम! 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अनुभव इंग्लंडवारीमधले — ☆ प्रा. डॉ. सतीश शिरसाठ ☆

प्रा. डॉ. सतीश शिरसाठ

??

☆ अनुभव इंग्लंडवारीमधले  — ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

१ ) झोप…

इंग्लंडला  जाण्यासाठी मुंबईच्या  विमानतळावर उभा  होतो. कुठल्याही एस.टी.स्टॅन्डवर  किंवा रेल्वेस्टेशनवर  दिसणारी धावपळ  इथेही  दिसत होती. फरक  इतकाच की, इथे  सगळयाच बाबी चकचकीत होत्या. चेक इन वगैरे प्रक्रिया करून  आपले प्रस्थान  अधिकाधिक सुखकर  आणि  सुलभ कसे  होईल  याचा प्रत्येकजण  प्रयत्न  करत होता. उत्कंठा, आनंद  सगळीकडे भरून  वाहत होता.आम्हीही  या प्रक्रिया  करून  एकदाचे विमानात  बसलो.

एअर  होस्टेलच्या मदतीने  हातातल्या  बॅग्ज  डोक्यावरच्या कपाटांत  बंद  करून विमानाच्या  नियमानुसार सीटबेल्ट  लावून खिडकीतून  बाहेरचे आकाश  निरखत बसलो. मुंबई  ते (इंग्लंडमधील) हिथ्रो  हा जवळपास  नऊ  तासांचा  प्रवास होता. कधी  झोपी गेलो ते कळलंच  नाही.

जीवनाचा  प्रवास साधारणत: असाच असतो…..  जन्मापासून  शिक्षण, उपजिविकेसाठीची धडपड, लहानमोठे आनंदाचे-दुखा:चे, विजय  आणि  पराभवाचे क्षण  या  आवश्यक प्रक्रियांतून  जाताना संसारातून  निवृत्तीचा कालखंड येतो. शरीर आणि  मनही  थकून गेलेले असते.आणि माणूस  झोपी  जातो. मात्र  ती  झोप न उठण्यासाठीची  असते… आणि नंतर असेच काही विचार मनात येऊन गेले 

—–

२ ) ती…

इंग्लंड मुक्कामात अनेकदा आम्ही घराजवळच्या गार्डनमध्ये पाय मोकळे करायला जातो. अशाच एका सायंकाळी गार्डनमधल्या लाकडी बाकड्यावर बसून आजूबाजूचे मखमली सौंदर्य  पहात होतो. अनेक कुटुंबं आपल्या बाहुल्यांसारख्या मुलांबरोबर हसत खेळत होते. दोन तरुण मुली आरामात सिगारेटचे झुरके घेत इकडून तिकडं फिरत होत्या. 

मी पाहिलं; एक सुंदर तरूणी एका झाडाजवळ उभी होती .फिकट निळ्या रंगाचे  जर्कीन तिला उठून दिसत होते. कानातल्या रिंगच्या लोलकातून प्रकाशकिरणे परावर्तित होऊन तिच्या चेहर्‍यावर  पडली  होती.

तिचे  लांबसडक रुपेरी केस  पाठीवरून कमरेवर रूळत होते .बराच वेळ एकाच ठिकाणी ती उभी होती. थोड्या वेळाने तिने सावकाश  हातातला मोबाईल बंद करून पर्समध्ये ठेवला. रूमालाने चष्मा पुसला आणि

झाडाजवळची क्रचेस ( चालताना मदत होणारी काठी)  डाव्या हातात घेऊन  तिच्या आधाराने ती लंगडत लंगडत चालू लागली.

—–

३ ) प्रेम हे प्रेम असतं…

इंग्लंडच्या मुक्कामात एकदा मी सहकुटुंब लंडनला गेलो होतो. सायंकाळी घरी परतताना स्टेशनवर आलो. परतीच्या ट्रेनला थोडा उशीर होता. दिव्यांच्या प्रकाशात झगमगणा-या त्या अलिशान स्टेशनवर एका 

कोपर्‍यातल्या  सिमेंटच्या बाकड्यावर मळकटलेल्या कपड्यातलं एक मध्यमवयीन जोडपं बसलेलं पाहिलं. माझी नजर तिथेच खिळून राहिली. वास्तविक असं कुणाकडं (विशेषत:अनोळखी असतील तर) टक लावून पहात बसणं चुकीचं असतं. पण का कुणास ठाऊक मी पहात राहिलो. तो हमसून हमसून रडत होता. ती त्याला समजावून काहीतरी सांगत होती. शेवटी एखाद्या लहान मुलासारखं तिनं त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन ती थापटत राहिली. थोड्या वेळानं तो उठला आणि तिच्या हाताचं चुंबन घेतलं. ट्रेनमध्ये प्रवास करतानाही माझ्या डोळ्यापुढून ते दृश्य  जात नव्हतं. मी विचार केला, कोण असतील हे दोघं ?

लंडन ही एक मायानगरी.अनेकजण पोट भरण्यासाठी इथं येतात. अशाचपैकी हे जोडपंही इथं आलं असेल. सारं सुरळीत चालू असताना, कदाचित त्याचं काम बंद पडलं असेल. हतबल होऊन तो रडत असेल. पण 

” काळजी करू नकोस.मी आहे तुझ्यासोबत ” . असा धीर दिल्यावर तो सावरला असेल .

‘टाऊन सेंटर ‘  या हिचीनमधल्या बाजारात एकदा चाललो होतो.सायंकाळची वेळ होती. इथे सायंकाळी दुकाने बंद असतात. उघडी असतात हाॅटेल्स आणि बार. एक  आजोबा पुढून येत होते. दोन्ही हातांनी ढकलत एका व्हीलचेअरवर आपल्या अपंग पत्नीला घेऊन चालले होते. मी त्यांना जाण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला.  हे पहाताच ते आजोबा मला म्हणाले,” साॅरी “.

” इट्स ओ.के.”

ते गेल्यावरही मी त्यांच्याकडं पहात राहिलो.

शनिवारचा दिवस होता. उद्या रविवार. सुट्टीचा दिवस. या दिवशी अनेकजण हाॅटेलांत आणि बारमध्ये  येत असतात. अशाच एका हाॅटेलच्या बाहेरच्या बाकावर एक तरूण जोडपं बसलं होतं. समोरच्या पदार्थांकडं त्यांचं लक्ष नव्हतं. एकमेकांच्या डोळ्यांत ते एकटक पहात होते.

लंडनमधील स्टेशनवर दिसलेलं  ते जोडपं ,मगाशी रस्त्यावरून चाललेलं ते वृध्द जोडपं आणि आता मी पहात असलेलं ते तरुण युगूल…या तिघांमध्ये मी प्रेम पाहिलं…. त्यांचे स्वरूप वेगवेगळे  होते .मात्र त्या तिघांतली प्रेमाची तीव्रता उच्च होती, हे मला प्रकर्षाने जाणवलं. 

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

सेवानिवृत्त प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२, ईमेल- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तुझे येणे… ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆

सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

??

☆ तुझे येणे… ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆

तुझे असे येणे .. जणू आनंदाचे गाणे

गत काळातील आठवणीत मन सुन्न सुन्न होणे

एकत्र घालवलेल्या क्षणांची जणू जत्राच भरून येणे

 

तुझे असे येणे जणू आनंदाचे गाणे

 

क्षण क्षण टिपून घेता सुख ओसंडून जाणे

शब्दांचा ही जणू आत्ता गोंधळ उडणे 

 

तुझे असे येणे जणू आनंदाचे गाणे

 

भेटीच्या  सुखद क्षणांची गुंफण करत जाणे

मैत्रीच्या ह्या नात्याला मनातल्या सिंहासनावर बसवणे

 

तुझे असे येणे जणू आनंदाचे गाणे

 

परतण्याची वेळ येता मन सुन्न सुन्न होणे

आठवणींचा आयुष्यात  कवडसा होवून जाणे 

 

तुझे असे येणे जणू आनंदाचे गाणे

 

© सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

साहाय्यक प्राध्यापिका, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी , कोंढवा पुणे

संपर्क :  सन युनिव्हर्स फेज २, एम ५०३, नवले ब्रिज जवळ, नऱ्हे, पुणे.

फोन   : ७५०६२४३०५०

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ पेपर तसा सोपा होता ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

??

पेपर तसा सोपा होता ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

लहानपणी आईने अ, आ, ई शिकवलं. अवघडच होते ते गिरवणं. पाटीवर पेन्सिल टेकवून लिहायचं. वेडंवाकडं निघायचं. कधी कधी आई रागवायची मात्र बऱ्याचवेळा हाताला हात धरून वळण लावायची. मग पाटीवर अक्षरे निघू लागली वळणदार. तरीही मी अक्षरांबाबतीत तसा कच्चाच राहिलो. आजपर्यंत ते सुधरलंच नाही. माझं अक्षर वाईट याचं वैषम्य अधूनमधून वाटत राहतं. पण ते सुधरवून घेण्याच्या भानगडीत मी पडत नाही. असं सांगतात की ज्याचं अक्षर चांगलं तो चांगला चित्रकारही होऊ शकतो. मात्र असंही आढळून आलंय की बडी बडी माणसं जी असतात त्यांचं अक्षर हस्ताक्षर वाईटच असतं. मी दुसऱ्या कॅटेगरीतला अशी साधीभोळी समजूत मी स्वतःला घालत असतो. 

आईचं गिरवून झाल्यावर पाठीशी लागली ती शाळा. शाळा कुणाला चुकलीय. असं तर बऱ्याचदा ऐकिवात आलंय की चौथी वा सातवी आठवीला शाळा सोडून माणसं मोठमोठे उद्योगपती, खेळाडू, थोर नेते बनलेत. माझ्या नशिबी तो योग नव्हता. शाळा काही सुटली नाही. पाटी काही फुटली नाही. मात्र शालेय जीवन होय जीवनच मस्तपैकी जगलो. गळ्यात गळा घालणारे मित्र मिळाले. हातावर छडी देणारे मास्तरही भेटले. पोटात चिमटा काढणे वा कान उपटणे, उठाबशा काढायला लावणे हा तर त्यांचा जन्मसिद्ध अधिकार असल्यासारखं असायचं. ते मारायचे व माया ही करायचे. त्यातून मात्र घडत गेलो. बाबा ही शाळेत शिक्षक होते त्यामुळे निदान माझी शिक्षा द्विगुणित व्हायची. वरच्या कक्षांमधे गेलो तसे चुका कमी व्हायला लागल्या. शिक्षणाची गोडी लागली. मग शाळेचे दिवस, रम्य ते दिवस होऊ लागले. मास्तरही आवडायला लागले. शिकणं झालं, खेळणं झालं, गेदरिंगमधे नाट्य नाटिका केल्या. जास्तीतजास्त मार्कं मिळवण्याची चढाओढ ही केली. वार्षिक परिक्षेचा रिझल्ट लागण्याचा दिवस अतिमोलाचा ठरू लागला. पहिला दुसरा नंबर आला तर कोण आनंद व्हायचा. जरी पहिल्या पाचामधे आलो तरी आनंद व्हायचा. मग सर्वांना रिझल्ट दाखवायची खुमखुमी यायची. नववीत असताना सायन्सच्या पेपरला तेरा सप्लिमेंट जोडल्या होत्या. सर्वात जास्त मार्क मिळाले. त्यापेक्षाही आमच्या शिक्षिकेने माझी संपूर्ण उत्तरपत्रिका नोटिसबॉर्डावर लावली होती. आदर्श उत्तरे कशी लिहावीत याचं प्रात्यक्षिक म्हणून. बरेच दिवस कॉलर टाईट होती. अकरावीची परिक्षा आली अन् गेली. त्या अगोदर सेंडॉफ झालेला. शाळा सुटल्याचं दुःख अपरिमित. काहीजण तर चक्क रडलेच. 

शाळा सोडून कॉलेजचे दिवस सुरू झाले. ते मोरपंखी का काय ते !! खरंतर ती गद्धेपंचविशीच होती. अभ्यासापेक्षा इतर उद्योगच जास्त व्हायला लागले. कविता काय, कथा काय भलतं भलतंच सुचू लागलं. त्यात कॉलेजच्या पहिल्या वर्षीच आंतरमहाविद्यालयीन दिवाळी अंक कथास्पर्धेत बक्षिस मिळालं तसं आमचा रथ दोन बोटं वरच धावू लागला. परिक्षा आली की अभ्यासाला लागायचं तेव्हढ्यापुरतं जमिनीवर. आणखीन मित्र भेटत गेले. धमाली घडू लागल्या. सहली घडू लागल्या. अरेतुरेची लज्जत यायला लागली. सगळं काही घडत होतं. नासिक काय पुणे काय, पुणे येथे तर काय उणे. सांस्कृतिक राजधानीच. उधाण न आलं तरच नवल. मन भरून जगलो ते दिवस, मन लावून अभ्यासही केला.  चारवर्षात डिग्रीधारक झालो. सगळ्या परिक्षा पास झालो. 

आता खरी परिक्षा सुरू झाली आयुष्याची. मध्यंतरी लग्न झालं हे ओळखलंच असेल बहुतेकांनी. काही दिवसांपूर्वी नातेवाईकाच्या मुलाचा साखरपुडा होता. त्याला शुभेच्छा देताना बेस्ट ऑफ लक ही म्हटले. वरतून म्हटलं, परिक्षेच्या अगोदर बेस्ट ऑफ लक म्हणतात ना तसं!! तर तो दोन मिनिटं माझ्यासमोर पहातच राहिला. मग त्याला समजवलं, त्याचं  असं असतं की प्रश्नपत्रिकेत जसं सांगतात ना की, एका ओळीत उत्तर द्या, आन्सर इन वन सेन्टेन्स, थोडक्यात लिहा, बी ब्रीफ, कोण कोणाला काय म्हणाले हू सेड टु हूम. जोड्या जुळवा, मॅच द पेअर, समानार्थी शब्द द्या, हे प्रकरण तसं अवघड, विरुद्धार्थी शब्द द्या, हे तसं सोपं. वरतून पत्रलेखन, निबंध, आत्मचरित्र, हे जसं परिक्षेत असतं तसं सगळं आयुष्यात ही असतं. तेव्हा तयार रहा, बी प्रीपेर्ड. तो होतकरू मुलगा खो खो हसायला लागला. मीही. खरंतर हे माझे अनुभवाचे बोल. 

किती परिक्षा दिल्यात? तसं तर पदोपदी परिक्षाच. एक पेपर सोडवून झाला की दुसरा हजर. रसायन शास्त्रासारखे इक्वेशन्स, इतिहासात असतात तशा लढाया त्या रक्तरंजित नसतात तरी जीवघेण्या नक्कीच. समाजशास्त्र मात्र इथे वेगळंच. सर्वात अवघड गणिताचाच पेपर आयुष्यातही. सोपे गणित लवकर सुटतं. कूटप्रश्न मात्र अनुत्तरित राहणारे. सोडूनच द्यावी लागतात. इथे हुशारी फारशी चालत नाही. कस लागतो तो समंजसपणाचा.  सुपरवायझर वरती बसलेला. अनेक जटिल प्रश्न व समस्या नव्या कोऱ्या प्रश्नपत्रिकेसारख्या. त्यातून तावूनसुलाखून बाहेर पडलो की हुश्श वाटणारं. अधिक मार्कांचा अट्टाहास इथे चालत नाही.  बऱ्याचवेळा स्वतःला हरवत इतरांना जिंकू देत पास होता येते आयुष्याची परिक्षा. पण एकूणच पाहिलं तर वाटतं आतापर्यंतचं जगणं पाहून, पेपर तसा सोपा होता. 

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डायरी माझी सखी… ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ डायरी माझी सखी…  ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

डिसेंबर संपत आला की नवीन वर्षाचे वेध लागतात .नवीन वर्ष म्हटलं की आठवते ती डायरी…..

दरवर्षी कोणीतरी मला डायरी देतं. त्या डायरीत सटर फटर  असं मी काहीतरी लिहायची.

वर्ष संपत आलं की थोडीशी पानं भरलेली असायची बाकीची  डायरी कोरीच असायची ….

त्या कोऱ्या पानांचा काय करायच हे कळायचं नाही. ठेऊन तरी काय करू…

असा विचार करून मी जुनी डायरी  फेकून द्यायची …

नवीन वर्ष नवीन डायरी …असं माझं वर्षानुवर्ष चाललं होतं…

काही वर्षांपूर्वी आकाराने जरा मोठी अशी एक सुरेख डायरी मला मिळाली. मनात आलं या डायरीचा आपण काहीतरी वेगळा उपयोग करावा… काय करावं ते मात्र सुचत नव्हतं. जानेवारी संपत आला तरी डायरी कोरी होती.

आयुष्याच्या संध्याकाळी कुसुमाग्रजांना कायमसाठी साथ करणाऱ्या कवितांसाठी त्यांनी  ‘ सखे….’

ही फार सुरेख कविता लिहिली आहे. ती माझ्या वाचनात आली. 

मनात आलं ही आपल्याला परत वाचावीशी वाटली तर लिहिलेली असावी….ते म्हणतात..

सखे..

तू दिलेलं चांदणं  

माझ्या पडशीमध्ये तुडुंब आहे….. 

आपल्यालाही अमाप आनंद कुसुमाग्रजांनी दिलेला आहे….. 

… आणि त्या दिवशी डायरीचा श्री गणेशा झाला.

आपल्याला जे आवडेल ते डायरीत लिहायचं असं ठरवलं..

वाटलं असं साहित्य आपल्याला कुठे मिळणार?

नंतर गंमत अशी झाली की डायरीत लिहावं असं सतत कुठे ना कुठे वाचायला मिळालं.

मासिकात ,पुस्तकात ,एवढेच काय अगदी रोजच्या वर्तमानपत्रात सुद्धा…

मग ते मी डायरीत लिहायला सुरुवात केली…

एकदा वाटलं आपण जे वाचतोय तेच डायरीत लिहितोय ..नंतर परत ते वाचण्यात काय गंमत वाटणार?

…  जरा विचार केल्यानंतर लक्षात आले की  कित्येक गोष्टी जुन्या होत नाहीत. काही वाचल्यावर लगेच समजत नाहीत. परत शांतपणे वाचल्यावर त्यातला गर्भित अर्थ समजतो..

काही गोष्टी चांगल्या असूनही आठवणीत राहत नाहीत ..त्यामुळे पुन: प्रत्ययात त्याचा आनंद निश्चित मिळेल.

हा नाद लागल्यावर डायरीत काही काही लिहीत गेले…..  बघता बघता डायरी भरली.

माझंच मला खरं वाटेना.  हातात घेऊन चाळायला लागले ..

डायरीत सलग असं काही लिहिलेलं नव्हतं .कुठेही काहीही होतं.

सहज  म्हणून सुरुवात केली होती आणि आता डायरीत खूप काही जमा झालं होतं.

अनेक कविता डायरीत लिहिल्या आहेत. वाचून वाचून पाठ  झाल्या आहेत .

एकदा मैत्रिणी घरी आल्या तेव्हा  त्यातल्या काही कविता वाचल्या. मैत्रिणींना काही कविता आठवल्या. त्या डायरीत लिहून घेतल्या….  तो दिवस कवितांचा झाला अनपेक्षितपणे खूप आनंद देऊन गेला.

हिणाबाई एका कवितेत म्हणतात …. 

माझं सुख माझं सुख 

हंड्या झुंबर टांगलं 

माझं दुःख माझं दुःख

तयघरात कोंडलं ….. 

त्यानंतर खूप दिवसानंतरच्या एका पानावर होत …. 

“ माय जॉय इस पब्लिक प्राॅपर्टी बिटवीन मॅन अँड मॅन 

माय पेन इज प्रायव्हेट प्रॉपर्टी 

बिटवीन गाॅड अॅन्ड मी …. “

या ओळी कोणाच्या आहेत  हे मी  लिहिलेलं नाही .कुठून पाहून लिहिल्या हेही मला आठवत नाही.

पण जगाच्या दोन टोकाला राहणाऱ्या लेखकांच्या  विचारांमधला आशय किती मिळता जुळता आहे हे वाचून आश्चर्य वाटलं. 

आपल्या साध्या सुध्या बहिणाबाई विषयी आदर दाटून आला…

“ हु मुव्हड माय चीज “ ह्या पुस्तकाचं मराठीतील थोडंसं स्वैर भाषांतर मध्यंतरी मी वाचले होते. त्यातली काही वाक्य डायरीतल्या एका पानावर आहेत.

बदल घडतात

बदलाचा अंदाज घ्या 

बदलावर लक्ष ठेवा 

बदलाचा आनंद  घ्या

बदलाला तयार व्हा

हे वाचताना मी विचार करायला लागले… त्या पुस्तकातले अजून काही काही मला आठवायला लागले.

मनात आले रोजच्या जीवनात हे किती उपयुक्त आहे.

जे कृष्णमूर्ती, वामनराव पै, गोंदवलेकर महाराज, विनोबा भावे, निसर्ग दत्त महाराज यांची व अजूनही बऱ्याच जणांची सुंदर सुंदर वचने डायरीत मी कुठे कुठे लिहिली आहेत.

.. मनाला आधार देणारी उभारी देणारी अशी कित्येक वाक्य या डायरीमुळे आज हाताशी आहेत.

ही एकदा वाचून उपयोग नाही. ती वारंवार वाचली तरच मनात खोल शिरून तिचा परिणाम होईल .

अशी अर्थगर्भ अशी ती वाक्य आहेत…  अर्थात त्याचा रोजच्या  व्यवहारात उपयोग करून घेतला पाहिजे हे  पण समजते आहे.

डायरीत काही अभंग ,गौळणी, गाणी आहेत … 

पावनेर मायेला करू…. .  

सुखी नांदते संसारी बाई 

नाही मागणं आणि काही

काळी पोत ही जन्माची देई

तूच सांभाळ आई लेकरू…

या ओळी वाचताना डोळे भरून येतात… मन कातर हळवं होतं..

एके दिवशी गंमत झाली होती.  मी त्या दिवशी रागवले होते ..रुसले होते… कुणाला काही सांगावं कुणाशी काही बोलावं असं वाटत नव्हतं.

…  नंतर मीच माझ्याशी बोलले होते.. स्वसंवाद साधला होता .स्वतःची समजूत काढून सावरले होते. आज डायरी चाळताना ते मला आठवले… त्या दिवशी डायरीत होतं . 

चालायचंच 

जाऊ दे 

सोडून दे ना

टेक ईट ईझी 

….  आज हे वाचताना मस्त वाटलं…

सांकेतिक पण मला कळणारी अशी बरीच वाक्य डायरीत आहेत.. एका पानावर होतं

‘मी शहाणी कधी होईन..’ 

त्या दिवशी मी केलेला वेडेपणा

अहं..नाही हं तो नाही सांगणार…

त्या दिवशी खरंच माझ्या हातून चूक झाली होती. ती मला कळली होती त्यातून मी धडा घेणार होते. शिकणार होते . ती चूक  परत होऊ नये म्हणून दक्षता घेणार होते.

पुढे लिहिलं होतं …. 

भले बुरे जे घडून गेले

विसरून जाऊ सारे क्षणभर

जरा विसावू या वळणावर….

या क्षणी डायरी वाचताना मीही क्षणभर थांबले…

वर्षभर जसं वागले त्याचा थोडाफार ताळेबंद या डायरीत आहे .डायरीमुळे मी माझ्या मागच्या दिवसांकडे वळून बघू शकते आहे.

डायरी वाचताना आठवली ती खूप वर्षापूर्वीची कॉलेजची रंगीबेरंगी डायरी …त्यात शेर शायरी, हिंदी  मराठी गाणी, कादंबरीतले उतारे आणि बरंच काही होतं …

शेवटच्या पानावर तर काय काय होतं…

बहरण्याचे ..खुळावण्याचे… फुलण्याचे… ते दिवस होते….  ती डायरी वेगळीच होती. लग्नानंतर ती माहेरी राहिली… परत कधीतरी आणली आणि वाढणाऱ्या संसाराच्या पसाऱ्यात कधी आणि कुठे हरवली कळलच नाही ….

संसारात मी पण पार बुडून गेले. आता आयुष्याला थोडा निवांतपणा आला आहे.म्हणून डायरी लिहायला वेळ मिळत आहे. 

नंतर पुढच्या डायऱ्या थोड्या प्रौढ प्रगल्भ झाल्या आहेत… माझ्यासारख्या कदाचित…

नंतरच्या एका डायरीत असं लिहिलं आहे की..

“तुम्हाला असं मनात कितीदा वाटलं की मी फक्त एवढे बोललो असतो तर…….

हो हो  सगळे पटते.. पण पटतही नाही … असं कसं होऊ शकतं…  चलता है…

ही वाक्य आत्मनिरीक्षण करायला लावणारी आहेत. सहज सोपी शिकवण देणारी आहेत.

तर सांगायचं तात्पर्य म्हणजे…

डायरीत खूप काही जमा झालं आहे. दोन-चार मैत्रिणींनाही हा नाद लागला आहे..

माझे  काय ..  तुझ्याजवळ काय याची चौकशी होत आहे..

एकमेकींना नवीन काही वाचून दाखवलं जात आहे..

तुमचं काय…

 तुम्हाला हा प्रयोग करावासा वाटतोय का ?

करून बघा ना …. काय हरकत आहे…

कदाचित तुमची डायरी पुढच्या वर्षी तुम्ही मला दाखवाल …

तुम्ही माझ्यापेक्षा वेगळं लिहिलं असेल… 

आपल्या दुसऱ्या मैत्रिणींनी अजून काही लिहिलं असेल..

 सगळ्यांचा मिळून एक  छानसा खजिना तयार होईल ..

घ्यायचा आहे का नवीन अनुभव.. करायची का सुरुवात..

आजकाल आपण हाताने फार  कमीच लिहितो…. मोबाईलवरपण बोलून टाईप होत…

लिहायला विसरत चाललो आहोत का?

पण एक सांगू का .. लिहून बघा.

आपण स्वतः लिहिले की शब्द लक्षात राहतात… आणि त्याचे अर्थ पण…

हे लिहिणं निखळ आनंद देतं…. असं लिखाण आपलं आपल्याला समृद्ध करतं …शहाणं करतं..

ही डायरी आता नुसती डायरी नाही राहिली… ती माझं विसाव्याचं विरंगुळ्याचं ठिकाण झालंय…

तिच्याशी मी कधीही बोलू शकते…..  जिला मी मनातलं काही सांगू शकते …  अगदी कधीही ..

अशी ही डायरी माझी सखी झाली आहे… मैत्रीण झाली आहे…

बघा प्रयोग करून ….. तुम्हालाही तुमच्यातलं काहीतरी नवीन गवसेल….

आयुष्यभर पुरणारं ….साथ देणारं….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जिंदगी धूप तुम घना साया… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ जिंदगी धूप तुम घना साया … ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

दूर कुठे प्रवास करायचा तर जुनी गाणी ऐकत प्रवास करायला बहुतेकांना आवडते. 

तसेच मी पण लांबच्या प्रवासात गाणी ऐकताना जावेद अख्तर यांचे जगजीत सिंह यांनी गायलेले

तुमको देखा तो ये खयाल आया । जिंदगी धूप तुम घना साया।

हे गाणे लागले होते. पळणारी झाडे घरे पहात हे गाणे ऐकताना विचारांनाही चाके लागली आणि त्यात मन रंगून गेले.

खरेच आयुष्य जगायचे म्हणजे त्यामधे कोणीतरी भक्कम साथ देणारे असावेच लागते. मग ती साथ जोडीदाराची , मित्र/मैत्रिणीची, आई-वडिल, मोठ्या व्यक्तींची, हितचिंतकांची असो. पण जीवनातील सुख दु:खे आपण कोणाबरोबर तरी वाटून घेतली तर जगण्याची मजा कितीतरी पटीने वाढते ना?

अशावेळी आपल्या आयुष्यातील त्या व्यक्तीचे स्थान अनन्यसाधारण होऊन जाते. ते किती अनमोल आहेत हे सांगायलाच आपल्या जोडीदाराला उद्देशून लिहिलेले जावेद अख्तरांचे हे शब्द. 

जोडीदाराबद्दल जरी लिहिलेले शब्द असले तरी आपल्या आयुष्यात असलेल्या अनन्यसाधारण महत्वाच्या कोणत्याही व्यक्तीला हे शब्द अगदी लागू पडतात.

ज्याच्यामुळे आपले आयुष्य घडते, ज्याच्यामुळे आपण संकटावर मात करू शकतो, ज्याच्यामुळे मनाला एक उमेद मिळते, त्याबद्दल असे विचार येतात. जेव्हा मन पोळलेलं असत, संकटांनी घेरलेलं असतं तेव्हा त्याला शीतलता देणारं, आशा दाखवून चांगली वाट दाखवणारं असतं तेव्हा त्या व्यक्तीबद्दलचा आदर वाढलेला असतो. 

नवर्‍याच्या यशामागे भक्कमपणे उभी राहिलेली पत्नी, मुलांना मोठे करण्यासाठी दिवसभर राबून कौतूक करणारे आई-वडिल, होतकरू हुषार मुलाला चांगल्या शिक्षणासाठी मदत करणारे शिक्षक, संकटात सापडलेल्या मित्राला मदतीचा हात देऊन कायम त्याच्या बरोबर रहाणारा मित्र, कोणा चांगल्या मुलाला अनुभवाचे बोल सांगून त्याच्या मनाला उभारी देणार्‍या मोठ्या व्यक्ती, एखाद्याचे चांगले गुण ओळखून त्या गुणांना प्रोत्साहन देणारे हितचिंतक हे सगळे मग घना छाया होतात आणि ओठी शब्द येतात जिंदगी धूप तुम घना साया•••

पण याही पेक्षा मोठा अनुभवही आला. आमच्या समोरच रहाणार्‍या ८५ वर्षाच्या आजी. काही दिवसांपूर्वीच त्यांचे यजमान वारले. मुलगा परदेशातून येऊन काही दिवस राहिला. पण नंतर त्याला जावेच लागले. मुलगी पण सासरी गेली. 

मुलगी म्हणाली चल माझ्या सोबत. मुलगा पण म्हणाला तुला तिकडे परदेशात नेतो. पण आजीचा हट्ट जो पर्यंत माझे हातपाय धड आहेत तो पर्यंत मी कुठेच येणार नाही. अगं पण तू एकटी कशी राहशील? मुलांनी काळजीपोटी ते पण विचारले तेव्हा त्या म्हणाल्या, मी एकटी कुठे? माझ्या बरोबर तो तारणहार आहे ना . तो करेल सगळं नीट. आजपर्यंत माझे सगळे सुख दु:ख मी त्याला सांगत आले आणि कोणत्या ना कोणत्या रुपाने त्यानेच तर माझी मदत केली. 

यावेळी पण तो माझ्या सोबत आहे आणि इथून पुढेही राहील. 

दूर कुठे तरी तेच गाणे लागले होते तुमको देखा तो ये खयाल आया••• आणि लगेच सगळ्यात श्रेष्ठ तो परमेश्वर आहे याची खात्री पटली आणि जिंदगी धूप तुम घना साया या गाण्याची प्रार्थना झाली.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “उरलो आहे दोन दिवसांपुरता…” ☆ श्री कचरू चांभारे ☆

श्री कचरू चांभारे

? मनमंजुषेतून ?

☆ “उरलो आहे दोन दिवसांपुरता…” ☆ श्री कचरू चांभारे ☆

पशूपक्षांनो एकदा भेटून जावा .. 

काल फोन आला म्हणून वडाखाली थांबलो.फोन कट झाला म्हणून पुढे निघणार एवढ्यात जुनाट वटवृक्षाचा आवाज कानी आला.

“ आता माझा आसरा, विसरा. माणसाच्या विकासाचा रस्ता डोंगर सपाटीकरणातून व रस्ते रूंदीकरणातून जातो म्हणतात. रूंद दृष्टी नसलेल्या विकासकाला आधी खुपते झाडाचे अस्तित्व अन् सुरू होते झाडांची खुलेआम लंगडतोड, बेसुमार नृशंस हत्या.’

“ जंगल नावाच्या आमच्या आप्तातील जवळचे शेजारी भावकीतील लहानमोठी वड, सोयरे असलेले बाभुळ, लिंब धाराशयी झाले आहेत.यांत्रिक करवतीचे करकर आवाज माझ्या कानात घुमत आहेत. वर्षानुवर्षे वादळवारा ऊनपाऊस यांना समर्थपणे तोंड देणारे माझे भक्कम शरीर इवलुशा करवतीच्या करकरीने थरथर कापत आहे. पूर्वी कुऱ्हाडीने वृक्षतोड असल्यामुळे आमचा जीव जायला बराच वेळ लागायचा .घाव झेलत , कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणत ,दांड्याला नावं ठेवत कुऱ्हाड पात्याला व घाव घालणाऱ्या हाताला सहीसलामत सोडत मृत्यूशय्येवर काही दिवस तरी नक्कीच जायचे. आता तेजतर्रार कर्रकर्र करवतीच्या पापात दांडा म्हणून आमचा भाईबंद नाही. करवतीचा वेग व धार इतकी जलद आहे की शेकडो वर्षे लागलेलं, कमावलेलं वटलेलं आमचं शरीर क्षणात भुईसपाट होतं.करवतीच्या धारेमागे.  माणसाचा वेगवान हैवानी दिमाख आहे हे कळल्यामुळे आता आम्ही आमच्या गोतास नाव ठेवत नाही व करवतीलाही दोष देत नाही. शेजारच्या मरणासन्न झाडाचं दुःख करायला सवडच नाही कारण वीज चमकण्याच्या अवकाशातच काही क्षणातच शेजारचे दुसरे झाडही लगेच धाराशयी.”

“ माझा शेंडा कॅमेरा बनून शेजारचा विध्वंस पाहतो आहे. पारंब्याला त्याने मरणाला तयार राहा म्हणून संदेश दिलाय‌. मृत्यूचे भय सर्वच सजीवाला असतं कारण मृत्यूचे दुसरं नाव अस्तित्व अंत आहे. वाटसरूंना ऊन्हात सावली दिली. पावसात आडोसा दिला. वादळात सहारा दिला. वाळलेल्या पानाआड किड्यामुंग्यांना घर दिले,अन्न दिले, जमिनीला कस दिला. पक्षांना घरटी दिली.अंडे पिल्ल्यांची राखण केली. भिरभिरत्या ढगांना थांबवलं.- मातीत रिचवलं .नदी ओढे तृप्त केले. पशूपक्षांनो माझे उरलेत दोनच दिवस ,या अन् भेटून जा. उगवतीवेळी व मावळतीवेळी जोरजोरात किलबिलाट करा. मला पक्षांचा आवाज ऐकत मरायचे आहे.”  

“तुमच्या माणसातले महामानव क्रांतीसूर्य जोतिबा फुले म्हणायचे …

… विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले। …

आता तुम्हाला विद्येचे महत्त्व कळले आहे. पण अजून झाडाचे महत्व कळायचे आहे.”

झाडाविना ढग कोरडे गेले

ढगाविना नदी तलाव आटले

नदी तलावाविना पशूपक्षी मिटले 

पशुपक्षाविना शेत पोत लोप पावले

शेतीविना समृद्धी वैभव लयास गेले

समृद्धीसाठी माणसं हैवान बनत गेले

हैवानियत रोखण्यासाठी पुन्हा हैवानच बनत गेले

एवढे सारे अनर्थ एका वृक्षतोडीने केले …….. 

© श्री कचरू सूर्यभान चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एथनिसीटीच्या पलिकडे… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा. डॉ. सतीश शिरसाठ

??

एथनिसीटीच्या पलिकडे… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

इंग्लंड मुक्कामात  मी एक दिवस  माझी पत्नी  आणि  मुलीबरोबर  लंडनमधील  महाराष्ट्र  मंडळाचा गणेशोत्सव  पहायला गेलो  होतो. दुपारचं  जेवण आटोपल्यावर हिचीनवरून  आम्ही ट्रेननं  लंडनला निघालो. हवेत  खूप गारठा  होता. पाऊस येण्याचीही  शक्यता होती. यादृष्टीने  छत्री, स्वेटर, जर्कीन  वगैरे 

अगदी  बंदोबस्तात  निघालो. ऑनलाईन तिकीट काढताना पाहिलं, एका कोपर्‍यात एक  मध्यमवयीन  बाई  एकटीच  मोठ्याने  बडबडत  होती. मला  ते विचित्र  वाटलं. मी प्रश्नार्थक  दृष्टीने मुलीकडे  पाहिलं. ” ती खूप  दारू  पिऊन बडबडत  असेल ” मुलगी  म्हणाली. तिकीट काढून पुढं जाताना पत्नी  म्हणाली, “काय  इथल्या  लोकांचं  जीवन!  एकाकी. कुणी बोलायला  नाही ते असंच  स्वतःशीच  बोलत  बसतात “. 

काहीही असो, इथल्या गो-या  लोकांच्या समाजजीवनातली  एक काळी  बाजू  मला समजली.

आठवत नाही, कोणत्यातरी स्टेशनवर  उतरून बसने  लंडनमधल्या महाराष्ट्र  मंडळाच्या हाॅलमध्ये  पोहोचलो. इंग्लंडमध्ये  रहाणारी शेकडो  मराठी माणसं  भेटली. काहीजण  इतर देशांतूनही आले होते. अनेक  पुरूष सलवार, कुर्ता तर महिला  साड्या  परिधान करून आल्या  होत्या . सगळ्यांच्या  चेहर्‍यावर आनंद, मनामनात उत्साह  आणि  सर्वत्र उत्सवाचे  वातावरण भरले होते. त्यात  काही जणांचे  इंग्लंडमध्ये मोठमोठे  उद्योग होते. कुणी  नोकरी  करत होते  तर  काही  विद्यार्थी होते. काही  मुलं  आपल्या आईवडीलांसोबत, तर काही  वयस्कर आईवडील  आपल्या  मुलांसोबत  आले  होते.

आपले  भौगोलिक, उत्पन्नाचे , वयाचे  आणि  इतर  भेद  विसरून ‘ मराठी माणूस ‘ या समान  मुद्द्यावर   या उत्सवात सारेजण  सहभागी  झाले होते. एंथ्रोपोलॉजी मध्ये याला एथनिसीटी  म्हणतात. 

आम्ही  पोहोचलो  तेव्हा सांस्कृतिक  कार्यक्रम सुरू  झाले  होते. अनेकांनी  विविध गीते, नृत्य, संगीत  सादर केले. त्यांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त  प्रतिसादही  मिळत होते. ‘ सैराट ‘चित्रपटातील झिंग झिंग झिगाट  गाण्यावर सारे सभागृह बेभान  होऊन  नाचत राहिले. ज्यांना  नाचणं जमत  नव्हतं, ते  टाळ्या वाजवून  साथ  होते.

रात्री  दहाच्या  सुमारास आम्ही  परत  जायला निघालो. एखाददुसरा माणूस  सोडला  तर रस्त्यावर  कुणीच  नव्हतं. त्यात बोचरी थंडी. काही बसचा प्रवास करून आम्ही पॅडिंग्टन स्टेशनवर  पोहोचलो. एका प्लॅटफॉर्मवरून संगीताचे सुरेल सूर ऐकू येत होते. उत्सुकतेने  जवळ जाऊन  पाहिलं. रेल्वेचा तो  बॅन्ड  होता. रेल्वे स्टेशन  म्हणजे, गाड्यांचा धडधडाट, इतर  काही  कर्णकर्कश आवाज, पॅसेंजरांच्या गोंगाटात  मिसळलेल्या निवेदकांच्या  सूचना, यांची  सवय असलेल्या मला हा आश्चर्याचा धक्का होता.

रेल्वेने हिचीन स्टेशनवर पोहोचलो तेव्हा रात्र खूप झाली  होती. कधी एकदाचं घरी पोहोचतो, आणि अंथरूणात शिरून झोपी जातो असं झालं होतं. चालता चालता वर पाहिलं. विस्तीर्ण आकाशात  जिकडं पहावं तिकडं अगणित तारे आणि ग्रह. कल्पना चावलांच्या एका  वाक्याची समर्पकता जाणवली .. 

“आकाशात पाहिलं की,आपण एका भौगोलिक सीमेत बांधले जात नाही”.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

सेवानिवृत्त प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२, ईमेल- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “चालले कोण तिकडच्या घरी ?” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “चालले कोण तिकडच्या घरी…” ☆ श्री सुनील देशपांडे

‘निघाले आज तिकडच्या घरी ’ असे म्हणत शंभर वर्षांपूर्वी मुली स्वतःच्या वडिलांचे घर सोडून, सगळे नातेवाईक, आप्त, मित्र मैत्रिणी यांना सोडून स्वतःच्या सासरी जात असत. मग त्यांना एका बागेतले झाड उपटून दुसऱ्या बागेत पुन्हा लावण्याचा प्रयत्न होत आहे.. ..  अशा पद्धतीची उपमा देऊन आणि त्यांच्या त्यागाची परिसीमा वर्णन करत त्यांच्याबद्दल सहानुभूतीचे वातावरण निर्माण करण्याची स्पर्धा सर्व कवी आणि साहित्यिकांमध्ये लागलेली असे. अगदी नाटक सिनेमासह सगळीकडे या पद्धतीने स्त्रीने स्वतःचे नातेवाईक, मित्र मैत्रिणी, आवडीनिवडी, शिक्षण, छंद, या सगळ्यांचा त्याग करून सासरची मंडळी ही 

देवासमान म्हणून त्यांचा छळ सहन करत आपले आयुष्य काढायचे. आपले जीवन सासरच्या घरास अर्पण करायचे. अशा प्रकारची परिस्थिती त्यावेळेला असेलही. अनेकांवर अन्याय झालाही असेल. नव्हे तो झाला आहेच. 

परंतु कालमान  परिस्थिती बदलत गेली. नोकरी व्यवसायानिमित्ताने गावाकडची माणसे शहरात येऊ लागली. लग्न झाल्यावर घरे अपुरी पडायला लागली.  पुरेशी घरे असूनसुद्धा योग्य ती प्रायव्हसी न मिळाल्याने होणारी कुचंबणा.  त्यातून बाहेर पडण्यासाठी वेगळ्या ठिकाणी राजा- राणीचा नवा संसार थाटून नवरा बायको नव्या वाटेवरून मार्गक्रमण करू लागले.  तरीही जुन्या काळचे त्याग जुन्या काळच्या त्या रोपटे उपटलेल्या उपमा यातून साहित्यिक तर नाहीच, पण व्हाट्सअपचे पोस्ट टाकणारे ट्रॉलर्स सुद्धा बाहेर पडायला तयार नाहीत.  स्त्रीच्या त्या महान त्यागाची, व्हाट्सअपवर सुद्धा रकानेच्या रकाने भरून वर्णने अजून येत राहिली.

साधारणपणे आमच्या आधीच्या पिढीपासून नंतर आमची पिढी आणि पुढील पिढी तर नक्कीच लग्नानंतर स्वतःचे स्वतंत्र संसार थाटू लागले. त्यामुळे मुलीची परिस्थिती आणि मुलाची परिस्थिती काही वेगळी राहिली नाही.  मुलगासुद्धा स्वतःच्या संसारासाठी स्वतःचे नातेवाईक, स्वतःची मित्रमंडळी, स्वतःच्या संपूर्ण वातावरणाचा त्याग करून दोघेजण एकमेकांच्या परिस्थितीत समसमान त्याग करून आपापले सुखी संसार थाटू लागले. आमच्या पिढीतले अनेक आई-बाप सुद्धा शक्य होईल तसे मुलांच्या स्वतंत्र संसारासाठी तजवीजही करू लागले. मुलगा लग्न झाल्यावर वेगळा राहणार हे नक्की होऊन ते नवीन गृहीतक बनून गेले. तरीही अजून सर्व मुले त्याकाळच्या स्त्रीच्या त्यागापुढे फिकी पडत गेली.

कित्येक वर्षांपूर्वी याबाबतीत मी आमच्या आईशी वाद घातला होता. मुलगी आणि मुलगा यांच्यामध्ये काहीच फरक नाही. दोघेही आपापले वातावरण सोडून एकत्र येऊन तिसऱ्या वातावरणात एकत्र राहतात. त्यामुळे त्यापैकी कोणी एक त्याग मूर्ती म्हणून मिरवण्याचे काही कारण नाही.  हा विचार डोक्यात होताच, पण त्याबाबत काही लिहावं हे मात्र डोक्यात आलं नाही. परंतु कालच व्हाट्सअप वर एक कविता पाहिली आणि आपल्याच मनातले विचार कुणीतरी सांगतंय हे लक्षात आलं. खरं म्हणजे व्हाट्सअप वर कविता फॉरवर्ड करताना काही माणसे मूळ कवीचे नाव काढून का टाकतात हे मला अजून समजले नाही.  काव्य करणाऱ्या कवीला त्याच्या हुशारीचे श्रेय द्यायलाच पाहिजे. परंतु खालील कवीला ते श्रेय नाकारून कुणीतरी ती फक्त कविताच मला फॉरवर्ड केली. अर्थात कोणाला त्या कवीचे नाव माहित असल्यास कृपया मला कळवावे … त्या कवीला शाबासकी देण्यासाठी. 

ती कविता पुढे देत आहे.  त्याला दाद मिळावी ही मनापासून इच्छा आणि अपेक्षा …. 

— पण मुलंही जातात घर सोडून…!

मुलांची पाठवणी होत नाही घरातून पण मुलंही जातात घर सोडून. 

आपलं घर, आपली खोली, गल्ली, मित्र अन गाव 

एका नेमणुकीच्या पत्रानंतर…….

 

रात्रभर कूस बदलत बिन झोपेचा, कण न् कण घराचा साठत राहतो उदास डोळ्यात….

 

आपलं जग मागे सोडताना, सर्टिफिकेट अन कपडे सुटकेसमध्ये भरताना……

भरलेल्या छातीत, मनाचं मेण होताना …….

आपली बाईक, बॅट, अन्  भिंतीवर लावलेले आवडत्या नायकांचे पोस्टर डोळे भरून पहात… 

ओलसर डोळ्यांनी कसंनुसं हसत मुलगा घराबाहेर पडतो. 

मुलांची पाठवणी होत नाही घरातून पण मुलंही जातात घर सोडून…..

 

रेल्वेच्या दारात डोळ्यातलं पाणी लपवत, 

हसतो मित्रांचा निरोप घेत, दुरावण्याचं दुःख लपवत,

हळूहळू चालत्या रेल्वे सोबत नाहीसा होतो मुलगा …….

मुलांची पाठवणी होत नाही घरातून पण मुलंही जातात घर सोडून ….

 

आता ऐकू येणार नाहीत मित्रांच्या बोलवण्याच्या हाका 

आणि वाजणार नाहीत दाराबाहेर खुणेचे हॉर्न …

घराच्या गेटवर आता जमणार नाही मित्रांच्या हास्यकल्लोळाचा मेळा…….

 

उंबरठा ओलांडतांना घराचा, त्यालाही रडावसं वाटतं.

आईच्या गळ्यात पडून पुन्हा मूल व्हावसं वाटतं.

पण जबाबदार्‍यांचा बंधारा

अश्रूंची वाट अडवतो, 

मुलगा मग सार्‍या भावना खोल छातीत दडवतो……

 

मुलीच्या पाठवणीच्या कौतुकात, माहेर तुटण्याच्या दुःखावर शेकडो गीतं लिहिली गेलीत. 

पण मूलं मात्र घराच्या अंगणातून सुटकेस घेऊन शांतपणे निघून जातात ….

 

एका अनोळखी शहरात,

जिथे कोणीही त्याची वाट पहात नाही 

अशा कुठल्यातरी एका घरात 

मुलं मुळातून दुरावण्याचं दुःख शांतपणे सहन  करतात ….

 

हो हे खरच आहे की मुलांची पाठवणी होत नाही घरातून,

पण मुलंही जातात घर सोडून …..

मुलंही जातात घर सोडून …….!

( कवी – अनामिक )

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares