“आमच्या पिढीला खूप कष्ट करावे लागले. खूप खस्ता खाव्या लागल्या. आमच्या आधीच्या पिढीला अशी धावपळ नव्हती, स्वास्थ्य होतं. आमच्या पुढची पिढी कामं खूप करते, पण पैसाही तसाच मिळतो की !!”
मला वाटतं की प्रत्येक पिढीतली माणसं हेच म्हणत असतात ! त्याचं कारण एकच. “परदु:ख शीतलम् !!”
खरं म्हणजे प्रत्येक पिढी अतोनात कष्ट करून, अगदी रक्त आटवून आपला संसार चालवत असते आणि जेवढं जमेल, तेवढं काहीतरी पुढच्या पिढीसाठी करून सुद्धा ठेवत असते ! आपल्या वकुबानुसार, आर्थिक परिस्थितीप्रमाणे आणि स्वतःच्या बुद्धी/समजूतीप्रमाणे. पण अनेक ठिकाणी पुढच्या पिढीला त्याची फार मोठी किंमत वाटत नाही, कारण परिस्थिती बदललेली असते. आर्थिक स्तर उंचावलेला असतो. गांवाकडे घेतलेली जमीन किंवा बांधलेलं घर, ही asset नसते, तर liability ठरत असते. त्यामुळे आधीच्या पिढीच्या कामगिरीवर विनाकारण शेरेबाजी सुरू होते. “खूप ओढाताण करून गांवाला तीन एकर जागा घेतली त्यांनी. त्याच्या ऐवजी मुंबई-पुण्याकडे तीन गुंठे जागा घेतली असती तर ? आणि त्यावेळी त्यांना ते शक्य सुद्धा होतं !!”
अशा comments वर काय बोलणार? त्यामुळे मधल्या आळीतले झंपूनाना चितळे रोखठोक म्हणायचे तेच खरं, ” ज्याचे त्याने स्वतःपुरते बघावे. जास्तीत जास्त, कंबरेस चड्डी बांधण्यापुरती नाडी दुसऱ्यास द्यावी. अखंड चड्डी देण्याच्या भानगडीत पडू नये. त्यात आपलीच लंगटी सुटते. शेवटी ज्याचा तो !”
… हा खरा लाख मोलाचा सल्ला !!
लेखक : सुहास सोहोनी.
मो ९४०३०९८११०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ शब्द-गप्पा-पुस्तकं आणि बरंच काही… ☆ श्री मनोज मेहता☆
शब्द हे माणसांसाठीच आहेत,माणसं एकमेकांना भेटली पाहिजेत. हल्ली माणसं माणसांना भेटताना सुध्दा मनात किंतु ठेवतात. हा किंतु वगळून भेटल्यास चांगला समाज निर्माण होईल. ही सहज सोप्या शब्दात माणसाची आणि गप्पांची ओढ व्यक्त केली आहे ज्येष्ठ साहीत्यिक शन्ना नवरे यांनी.
छायाचित्रकार मनोज मेहता आणि शन्ना नवरे यांच्या मैत्रीला ४० वर्षे पूर्ण झाल्याचा “(१० ऑक्टॉबर २०१२)” छोटेखानी कार्यक्रम नुकताच शन्नांच्या घरी झाला. या कार्यक्रमात छायाचित्रकार मनोज मेहता आणि शन्ना नवरे यांच्या मैत्रीचे बंध उलगडले आणि विचारांच्या धाग्यांनी अधिक घट्टही झाले. हल्ली माणसं एकमेकांना भेटत नाहीत, त्यांना भेटण्यासाठी, बोलण्यासाठी वेळ नसतो. रस्त्यात आपण कोणाला भेटलो तरी तोंडभरून हास्य येत नाही, कोणी फोन करून आपल्याकडे येणार असेल तर तो कशासाठी येतोय ? असा विचार मनांत येतो, यातून भावनिक गुंतवणूक कमी झाली आहे.
या गप्पांच्या ओघात त्यांनी त्यांच्या अनेक स्नेह्यांच्या आठवणी सांगितल्या. यामध्ये कवयित्री लेखिका शांत शेळके यांच्या आठवणी सांगितल्या. त्यांचे वाचन आणि शब्दांचा अर्थ शोधण्याची हातोटी,जिद्द सांगितली. भाषा लिहिताना ती शुध्द हवी असेही स्पष्ट केले. तसेच लिहिताना आणि वाचतानाही अनेक अशुध्द शब्द सहज वाचतो याबद्दल खंत व्यक्त केली.
या मैत्रीच्या वातावरणात शन्नांनी पुस्तकाबरोबर मैत्री कशी करावी? कुठलेही नवंकोरं पुस्तक हाती आल्यावर त्याला कव्हर घालावं तेही चांगलं, त्यानंतर पुस्तकात बुकमार्क घालावे, पुस्तकाची पाने दुमडू नयेत अशामुळे पुस्तक आपलेसे होते आणि अधिक काळ आपल्याकडे राहते.
छोटेखानी कार्यक्रमाची सांगता छायाचित्रकार मनोज मेहता यांनी करत शन्ना म्हणजे ” वेळेच्या बाबतीत ब्रिटीश, कामाच्या बाबतीत जपानी आणि संस्कार संस्कृतीचे पक्के भारतीय ” असा गौरव केला. नवरात्राच्या आठव्या माळेला हा कार्यक्रम नवरे रंगात डुंबून गेला अन मैत्रीची माळ अधिकच घट्ट झाली.
☆ – किती रे तुझे रंग… – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆
एक उत्तम संगीतकार, कवी, गायक, विडंबनकार, लेखक, गुरू, इत्यादी विविध पैलू, विविध रंग, व्यक्तिमत्वात असलेल्या देवकाकांना प्रथम स्मृतिदिनानिमित्त आणि पाठोपाठच असलेल्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या शब्दांत मी आदरांजली वाहतेय –
“किती रे तुझे रंग किती रे तुझ्या छाया
दोनच डोळे माझे उत्सव जातो वाया (उतू जाणे)”
१९९५ च्या दरम्यान नाशिकच्या दातार परिवाराने निर्मिलेल्या माझ्या पहिल्या ‘ही शुभ्र फुलांची ज्वाला’ या cd साठी जेव्हा शशी – उषा मेहता (ज्येष्ठ कवयित्री) या दाम्पत्याने काव्यनिवडीसाठी मदत केली. उत्तम दर्जेदार काव्य नि दर्जेदार संगीत असलेल्या कविता माझ्या आवडीने निवडल्या गेल्या. त्यावेळी विंदांची ‘सर्वस्व तुजला वाहुनी’, ‘मागू नको सख्या’, ‘अर्धीच रात्र वेडी’, सुरेश भटांची ‘एवढे तरी करून जा’, ग्रेस यांची ‘पाऊस कधीचा पडतो, ‘ शांताबाई शेळकेंची ‘प्रीती जडली तुझ्यावरी’…. अशा एक से एक सुंदर रचना निवडल्या गेल्या. गंमत म्हणजे सगळ्यांचे संगीतकार – यशवंत देवच होते. या अलिबाबाच्या गुहेतल्या, रत्नांचा हार परिधान करायचे भाग्य मला मिळाले. वेस्टर्न आऊटडोअर सारख्या अप्रतिम स्टुडिओत ही रेकॉर्डिंग्जस व्हायची. ‘सर्वस्व तुजला वाहूनी… गाताना सॅक्सोफोन वादक मनोरीदा, सरोद वादक झरीनबाई दारुवाला अशा दिग्गजांचे प्रत्यक्ष भावपूर्ण सूर कानावर पडल्याने लाइव्ह गाणे गाताना गाणे ही तसेच प्रकट होत असे… प्रत्येक टेक फर्स्ट टेक असे. टेक झाल्यावर मी गाणे ऐकण्यासाठी रेकॉर्डिंग रूम मध्ये गेले… देव साहेबांच्या अश्रुधारा वहात होत्या. त्यांनी मला पाठ थोपटून शाबासकी दिली आणि डोळे पुसत ते म्हणाले, “अत्यंत सुंदर आणि हृदयापासून गायलात पद्मजाबाई!” माझ्यासाठी हे मोठं बक्षीस होतं. शब्दप्रधान गायकीत कुठे काय कसे गावे याचे, त्यांनी पुस्तक लिहून अगदी नवोदितांसाठी सुद्धा वस्तुपाठ रचला. गाणे प्रथम मेंदूतून व नंतर गळ्यातून गायले जाते मगच ते सहज उमटते, ही गुरुकिल्ली त्यांनी मला दिली. त्यांची भाषणे ऐकायला आम्ही उत्सुक असू. त्यांची देववाणी प्रासादिक होती. विनोदबुद्धी शेवटपर्यंत तल्लख होती. कायम ते हशा आणि टाळ्या घेत. शेवटपर्यंत ते कार्यरत होते. शेवटी मात्र आजारपणात त्यांनी परमेश्वराला त्यांच्याच शब्दांत अशीच हाक घातली असेल…
नांवः डॉ. शैलजा शंकर करोडे (साहित्य भूषण), दलितमित्र, कामगार भूषण, गुणवंत कामगार — महाराष्ट्र शासन
शिक्षणः एम.ए. (अर्थशास्र)
व्यवसायः पंजाब नॅशनल बँकेतून Dy Manager पदी सेवानिवृत्त
प्रकाशित पुस्तकेः कथासंग्रहः आठ, कवितासंग्रहः तीन, चारोळी संग्रह :दोन, कृपाप्रसादः भक्तिगीत संग्रह, कादंबरीः चार, संदर्भग्रंथः खान्देशची लोकसंस्कृती व लोकधारा (उत्तर महाराष्र्ट विद्यापीठ जळगांवने लोकसाहित्य एम.ए. भाग 1 साठी संदर्भ ग्रंथ म्हणून लावला आहे), काॅलम लेखनः तरुण भारत, दै. गांवकरी
कामगार साहित्य संमेलन औरंगाबाद, अमरावती, नांदेड, नाशिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवली, सत्य शोधकीय साहित्य संमेलन, जळगाव, परीवर्तन साहित्य संमेलन जळगाव, फुले आंबेडकर साहित्य संमेलन, भुसावळ, समरसता साहित्य संमेलन, जळगाव, बोली भाषा साहित्य संमेलन, भुसावळ, अस्मितादर्श साहित्य संमेलन, जळगाव, औरंगाबाद, मुस्लिम मराठी साहित्य संमेलन, पनवेल, जळगाव, म. युवा साहित्य संमेलन, जालना, ओबीसी साहित्य संमेलन, जळगाव, साहित्य कला मंच कुडूस भिवंडी—साहित्य संमेलन, जळगाव जिल्हास्तरीय साहित्य संमेलन, अशा अनेक ठिकाणी निमंत्रित कवी, कवी संमेलनाध्यक्ष, कथासत्र अध्यक्ष, संमेलनाध्यक्ष. तसेच Online संमेलनांचे अध्यक्ष पद भूषविले आहे.
सन्मानप्राप्ती
1) महाराष्र्ट शासनाकडून विशेष कार्यकारी अधिकारीपदी नेमणूक
2) मराठी काव्यकोषातील महान ग्रंथ poetry mile stone या ग्रंथात “सामना” कवितेचा समावेश
3) महाराष्र्ट हिन्दी साहित्य अकादमीतर्फे “अभंग——महाराष्ट्र के हिन्दी कवी प्रातिनिधीक रचनाये” या ग्रंथात दोन कविता समाविष्ट
4) विश्व हिन्दी संमेलनसे संलग्न संस्था, महाराष्ट्र हिन्दी सेवी संस्थान द्वारा प्रकाशित “महाराष्ट्र के जिवंत हिंदी कवियोंकी रचनाये” या ग्रंथात ५ कवितांचा समावेश
5) ठाणे येथे आयोजित पोएट्री मॅरेथान या सलग 85 तास चाललेल्या व गिनीज रेकाॅर्ड तयार करणार्या कवी संमेलनात कविता सादर
6) आम्ही लेखिका गृप (ठाणे, मुंबई, नवी मुंबई) यांचेद्वारे आयोजित संमेलनात जेष्ठ साहित्यिक म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव सहभाग इत्यादी.
पुरस्कार प्राप्ती
१) दलितमित्र, गुणवंत कामगार, कामगार भूषण हे महाराष्र्ट शासनाचे पुरस्कार प्राप्त
२) दै.लोकमतचा “सखी” पुरस्कार, दै.सकाळचा “तेजःस्विनी” पुरस्कार, अखिल भारतीय भावसार क्षत्रिय महासभेचा “जीवन गौरव” पुरस्कार
अन्य पुरस्कार – ग्लोबल एकाँनामिक्स कौंन्सिल नवी दिल्ली चा “राष्ट्रीय रतन” पुरस्कार, कथासंग्रह “अग्निपरीक्षा” यास पंजाब नॅशनल बँकेचे राष्ट्रिय स्तरावरील पुरस्कार, एल्गार साहित्य रत्न पुरस्कार, भारतीय साहित्य अकादमीचा सावित्रीबाई फुले पुरस्कार, युवा विकास फाऊंडेशनचा बहीणाबाई काव्य पुरस्कार, युवा विकास फाऊंडेशनचा प्रा. राजा महाजन स्मृती पुरस्कार, अखिल भारतीय मराठी परीषद पर्यावरण संमेलन पुणे यांचा “जीवन गौरव पुरस्कार अकोला “साहित्यरत्न” पुरस्कार, “साहित्य भूषण” पुरस्कार, पंजाब नॅशनल बँकेचे कथा, कविता, निबंध लेखन “पीएनबी दर्पण व पीएनबी स्टाफ जर्नल मधील उत्कृष्ठ लेखन, तसेच हिन्दीचे सर्वश्रेष्ठ योगदान असे विविध 50 पुरस्कार प्राप्त, स्टेट बँक, महाराष्र्ट बँक, सेंट्रल बँक, विजया बँक, कॅनरा बँक यांचेही पुरस्कार प्राप्त
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष समाजसेवा पुरस्कार ——अनोखा विश्वास इंदौर म प्र., कामगार रत्न पुरस्कार मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई, नेरूल हिरकणी पुरस्कार, जलगाव हिरकणी पुरस्कार, “कर्तव्य योगिनी सन्मान” प्राप्त, आम्ही लेखिका, ठाणे जिल्हा द्वारा “नवदुर्गा सन्मान” प्राप्त, कोरोना योध्दा सन्मान, कवयित्री बहिणाबाई विशेष सन्मान, साहित्यभूषण पुरस्कार, नारी गौरव पुरस्कार
मनमंजुषेतून
☆ प्रेरणा… ☆ डॉ. शैलजा करोडे☆
चला सायंकाळचा स्वयंपाक आटोपला एकदाचा म्हणत मी थोडंस हुश्श केलं. मसालेदार खिचडी व स्वादिष्ट कढीचा छोटासा मेनू होता पण तेवढ्यानंही दमछाक होते आजकाल. “अगं वयपरत्वे होतं असं” मैत्रिणींचं अनुमान. “घाबरुन जाऊ नकोस, पण काळजी घे स्वतःची”.
मला हे सगळं आठवलं आणि चेहर्यावर स्मित पसरलं. चला आता थोडासा टीं व्ही लावून सह्याद्री वाहिनीवरील बातम्या पाहू असं म्हणताच, तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. मी काॅल रिसिव्ह केला. “नमस्कार मॅडम, मी नितिन महाशब्दे बोलतोय.”
“बोला सर, तुमचा नंबर सेव्ह आहे माझेकडे.”
“मॅडम आपण जाणतातच, आपल्या अक्षर मंच प्रतिष्ठानद्वारे ‘अखंड वाचन यज्ञ’ उपक्रम आपण राबवित आहोत. उद्या, म्हणजे 13 ऑक्टोबरला गावदेवी विद्या मंदिर, डोंबिवली येथे या वाचन यज्ञाचा आपण प्रारंभ करीत आहोत. शाळेतील विद्यार्थी सलग दोन तास अखंड वाचन करतील आणि ते ही प्रत्येक वर्गात. त्यानंतर बक्षीस वितरण आपल्या हस्ते होईल. संस्थेने पन्नास प्रमाणपत्र व पुस्तकं पाठवली आहेत बक्षीस म्हणून. आपल्यासारख्या जेष्ठ लेखिकेकडून या अखंड वाचन यज्ञाचा प्रारभ व्हावा व बक्षीस वितरण व्हावं ही अक्षर मंचसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपण जाणार ना मॅडम.”
“होय नितिनजी, जाईन मी. मला तुम्ही शाळेचा पूर्ण पत्ता पाठवा.”
“मॅडम, मी शाळेच्या मुख्याध्यापकांचा फोन नंबर पाठवतो, आपण त्यांना फोन करा. सर सविस्तर सगळं सांगतील. बरं मॅडम, रजा घेतो आपली. पुढचेही अनेक नियोजन आहेत. धावपळ होतेय खूप.”
“ओ के सर, धावपळ करत असतांना स्वतःची ही काळजी घ्या.”
“ओ. के. मॅडम, शुभरात्री.” नितिन महाशब्देंनी फोन ठेवला.
चला अजून एक नवीन काम करायचंय. वाचन प्रेरणेवर उद्या बोलायचंय.. तयारी करावी लागेल थोडीफार.
मी शाळेत बरोबर 12.15 ला पोहोचले. शाळा 12.30 ला सुरू होते. शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांचा चिवचिवाट सुरू होता. सोबत पालक आलेले होते आपल्या पाल्याला सोडायला. अशा या ज्ञानमंदिरात बालकांच्या किलबिलाटात मन एकदम प्रसन्न झाले. संस्थेचे जेष्ठ शिक्षक पाटील सरांनी माझे स्वागत केले व मला एका वर्गात छानपैकी पंख्याखाली बसवले.
शाळेची घंटा झाली. राष्ट्रगीत, राज्यगीत व प्रतिज्ञा संपन्न झाली. एव्हाना मुख्याध्यापक सरही आले व आम्ही त्यांच्या रूममध्ये बसलो.
शाळा छोटीशी होती. पूर्व प्राथमिक व प्राथमिक इयत्ता 7 वी पर्यंत. पण विद्यार्थी संख्या चांगली होती 418. इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी मराठी झाकोळून जात असतांना या शाळेने मराठी बाणा जपला होता. शिक्षकवृंद चांगला व मेहनती होता.
थोड्याच वेळात ‘अखंड वाचन यज्ञा’ला सुरूवात झाली. “मॅडम चला, जाऊया प्रत्येक वर्गावर, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल.”
मी वर्गावर जाताच सगळे विद्यार्थी उठून उभे राहिले व गुड माॅर्निंग टिचर, आपलं स्वागत आहे,” एका तालासुरात सगळ्यांनी म्हणत टाळ्यांचा कडकडाट केला. फळ्यावर आजचा उपक्रम व प्रमुख पाहुणे म्हणून माझे नाव लिहिलेले होते. मी सगळ्याच वर्गात जाऊन विद्यार्थ्यांचे वाचन ऐकले, वीर सावरकर, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, डाॅ. ए पी जे अब्दुल कलाम… छान वाचन सुरू होते.
शाळेच्या प्रांगणातच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार होता. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व डाॅ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या फोटोंचे पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. संस्थेचे प्रास्ताविक व विविध क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेतला जात होता आणि मी भूतकाळात शिरले होते, माझ्या शालेय जीवनात रमले होते.
“बरं का मीनाक्षी, उद्या जागतिक पुस्तक दिन आहे. आपल्या शाळेत कार्यक्रम आहे आणि प्रसिद्ध लेखक
उमाकांत नार्वेकर येणार आहेत. तुला उद्या भाषण करायचंय.;चांगली तयारी करुन ये. तशी तू प्रत्येकवेळी छानच भाषण करतेस. उद्याही करशील.”
सर्व शिक्षकवृंद व प्रमुख पाहुण्यांसमोर मी वाचन आणि पुस्तकाचे महत्व विषद करीत होते
“पुस्तकानेच होतो माणूस ज्ञानी,
ज्ञानानेच मिळतसे जीवनाला गती….”
” वाह, सुंदर, तू तर कविताही छान करतेस ” प्रमुख पाहुणे उस्फूर्तपणे बोलले. मला मिळालेली ही कौतुकाची पावती पुढे माझ्या लेखन यज्ञाला प्रेरक ठरली व कविता, कथा, कादंबरी, ललित, नाट्य, निबंध विविध अंगांनी फुलत गेली.
“आता आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मीनाक्षी परांजपे यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो”.
मी तंद्रीतून बाहेर आले. माईक हाती घेतला.
“आदरणीय अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, कर्मचारीवृंद आणि माझ्या देशाचे भविष्य घडविणारे आधारस्तंभ असणार्या विद्यार्थी मित्रांनो. आज तुम्ही अखंड वाचन यज्ञात सहभागी झालात. विविध ज्ञानोपासकांच्या पुस्तकांचं अभिवाचन केलंत. फार सुंदर. पण विद्यार्थी मित्रांनो, वाचनासाठी शिक्षणाचा गंध लागतो. आणि पूर्वीच्या काळी जनसामान्य व स्त्री वर्गाला शिक्षणाचा अधिकारच नव्हता. शिक्षण नसल्याने जनसामान्यांचे जीवन दुःखी होते. गुलामगिरीत खितपत पडल्यासारखे होते. ही बाब महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या लक्षात आली.
विद्येविना मती गेली
मतीविना निती गेली
नीतीविना गती गेली
गतीविना वित्त गेले
इतके सारे अनर्थ
एका अविद्येने केले
…म्हणून ज्योतिबा व सावित्रीबाईंनी शिक्षणाचा पाया रोवला. विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीमाई होत्या म्हणूनच आज मी तुमच्यासमोर भाषण करू शकतेय. त्यांनी दिलेला शिक्षणाचा वसा वसतेय.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेच आहे ‘वाचाल तर वाचाल’. स्वतः बाबासाहेब खूप वाचन करीत. परदेशातून भारतात येतांना त्यांनी 37400 पुस्तकांचं भांडारच जणू बोटीने भारतासाठी रवाना केले. पण बोट दुर्घटनेत ती सगळी पुस्तके गेली. यावरून लक्षात येईल की बाबासाहेबांना वाचनाचा केवढा व्यासंग होता. या व्यासंगातूनच जगातील सगळ्या राज्यघटनांचा अभ्यास करुन भारतासाठी समाजातील सर्व घटकांसाठी स्वातंत्र्य, समता व बंधुत्वावर आधारित परिपूर्ण संविधान त्यांनी लिहिले. बाबासाहेब म्हणायचे एक मंदिर बांधून 100 भिकारी निर्माण करण्यापेक्षा एक ग्रंथालय बांधा व 1000 विचारवंत तयार करा.
होय मित्रांनो, वाचनामध्ये खूप शक्ती असते. कारण पुस्तक वाचतांना पुस्तक व आपल्यात एक नातं निर्माण होतं. आपण पुस्तकाशी तादात्म्य पावतो. ते वाचन, ते विचार आपल्या काळजात घर करतात आणि यातूनच प्रेरणा मिळून आपल्या विचाराला, भावनेला गती मिळते, लेखनास आपणही प्रवृत्त होतो.
माझ्या शालेय जीवनात चांगले गुरूजन मला लाभले. कविताही खूप समजावून सांगायचे, ‘बेलाग दुर्ग जंजिरा’, ‘वसईचा किल्ला असला’, ‘ क्षणोक्षणी पडे, उठे परि बळे, उडे बापडी ‘, ‘ पोर खाटेवर मत्यृच्याच दारा ‘, ‘ बा नीज गडे, नीज गडे लडिवाळा ‘ या कविता वाचतांना, अभ्यासतांना तर माझ्या डोळ्यातून अश्रूधारा वहात असत. कवितेशी जोडली गेलेली मनाची ही तार मलाही कविता करण्यास सहाय्यक ठरली.
विद्यार्थी मित्रांनो, परवा भारताचे दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करतो.
डॉ. कलाम यांच्या मते, एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अनेक साहित्य पुस्तके वाचावी, आणि आपल्या जीवनाचा आणि समाजाचा उद्धार करावा.
जसे शरीराला अन्नाची गरज असते तसे आपल्या मेंदूला वाचनाची गरज असते. कारण त्यातूनच नव विचारांची ऊर्जा मिळते. विद्यार्थी मित्रांनो वाचनाचे पाच सहा फायदे आपणास सांगते.
वाचनामुळे मनाचा व्यायाम होतो.
वाचनामुळे विचार कौशल्य आणि विश्लेषणात्मक क्षमता सुधारते.
वाचन भाषेवर प्रभुत्व व प्रेरणेचा उत्तम स्रोत आहे.
वाचन मन आणि शरीरास ऊर्जा देते.
वाचनामुळे लक्ष आणि एकाग्रता सुधारते.
पण विद्यार्थी मित्रांनो आजच्या टी. व्ही. मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी वाचनसंस्कृती लयाला चालली आहे. आजच्या धावपळीच्या, स्पर्धेच्या व संघर्षाच्या युगात वाचनासाठी कोणाजवळ वेळच नाही. आजची शिक्षण पद्धती व गळेकापू स्पर्धा यामुळे विद्यार्थी वर्गाजवळही अवांतर वाचनाला वेळ नाही. तो विद्यार्थ्यांनी काढावा व आयुष्य सुख समृद्धीने परिपूर्ण व्हावे म्हणून हा आजचा ‘अखंड वाचन यज्ञ’ प्रपंच.
आपण यात सहभागी झालात, मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलंत, आपल्याशी मला हितगूज करता आलं, भरुन पावले मी. आपल्या व आयोजकांच्या ऋणात राहून इथेच थांबते.
धन्यवाद.”
एकेकाळी प्रेरणेतून घडत जाणारी मी आज एक प्रेरक ठरले होते. एक वर्तुळ पूर्ण झाले होते .
आपल्या हिंदू धर्मात व्रत-वैकल्य करायला वर्षभर वेगवेगळे सण येतात, त्यांच्या वेगळेपणाने सर्वांना मजाही येते.
सौ. मधुरा मनोज मेहता गेली २७ वर्षे अनेक आजारांशी झगडतेच आहे. प्रत्येकवेळी ती हसत – हसत त्यातून बाहेर पडते, हे तिचं कसबच म्हणावं लागेल. मधुराची नक्की मणक्याचीच शस्त्रक्रिया झाली की मेंदूची ? कारण २०१७ च्या मोठया शस्त्रक्रियेनंतर काही वेगळीच ऊर्जा तिला मिळाली की काय ? असा प्रश्न पडलाय मला !
व्यक्तिगत पत्र-लेखनाने याची सुरुवात झाली. मग हळूहळू ती कविता व चारोळ्याही करू लागली. अनोख्या पाककलेची तर ती सॉल्लिड, खिलाडी होतीच, आता तर अष्टपैलूच झाली. लॉकडाऊन पासून तर तीची गाडी सुसाटच सुटली आहे, अन् वेगवेगळे पदार्थ करून त्याचे फोटो काढायची मला सरळ अहो ऑर्डरच द्यायची आणि माझ्या पोटोबालाही ती जणू खुराकच देत आलीय. असो…
श्रावण महिना हा अनेक सणांची नांदी घेऊन येतो. आमच्या अमेरिकेत असलेल्या मुलीचे १ मे २०२१ ला virtual लग्न अमेरिकेत झाले. कोविडमुळे आम्ही जाऊ शकलो नाही, तिचा पंचमीचा सणही करू शकत नाही. त्यासाठी काही हटके करायचं, सौ. मधुरानं ठरवलं.
ती श्रावण महिन्यात रोज एका सवाष्णीला फोन करून संवाद साधत होती. त्यात तिच्या बहिणी, आई, मैत्रिणी, आमच्या दोनही मुली व माझ्या मित्रांच्या सौ. ही आल्या.
यावर्षी नवरात्रीला तर मधुराने कमालच केली. घटस्थापनेच्या दिवशी घरच्या देवीची ओटी भरून झाल्यावर, सकाळी व्हाटस्अपवर रोज त्या त्या देवीची माहिती सौ. मधुरा स्वतःच्या आवाजात म्हणून तिच्या निरनिराळ्या ६०/७० मैत्रिणींना पाठवत होती. नंतर दिवसभरात रोज नऊ मैत्रिणींना, त्यात २७ वर्षांपासून ते ८७ वर्षांच्या आजींपर्यंत फोनवरून संवाद साधत होती. प्रत्येकीशी संवाद साधत असताना, तिला त्यांचा चेहरा दिसत नसला, तरी दोघींच्या संवादातून होणारा आनंद, मी कधी – कधी हळूच अनुभवत होतो.
या नऊ दिवसात आमच्या घरी येणाऱ्या सौभाग्यवतीची ओटी भरायची. या वर्षी, नवमीच्या दिवशी उद्यापन रस्त्यावर कचरा गोळा करणाऱ्या, घरकाम करणाऱ्या स्त्रिया, ज्या आपल्या संसाराला हातभार लावून तो टिकवण्यासाठी धडपडत असतात, त्यांना वाण देऊन, आनंदोत्सव साजरा करताना मधुराचा चेहरा काय फुलून गेला होता ना, त्याला तोड नाही ! मनांत म्हटलं देवानू, माझ्या मधुराला अशीच कायम आनंदी ठेवा रे !
“आजची तरूण पिढी ऑनलाईन कामात किंवा कामावर असूनही व्यग्र असलेल्या, तर ज्येष्ठ मंडळी घरात कोणी एकटे अथवा आपल्या कुटुंबासह असायचे, अशावेळी सर्वांच्या वेळा सांभाळून, घरातील ज्येष्ठ व तरुण सौभाग्यवतींना सौ. मधुराचा अवचित आलेला फोन हा नक्कीच त्यांना आनंदून गेला असेल. तिला प्रत्येकाच्या घरी जाणं शक्य नसल्याने स्वतः फोन करून सर्वच पिढ्यांशी तिने संवादाचा सेतू बांधला. नाहीतरी आपले ‘सण-उत्सव’ साजरे करण्यामागे हाच तर हेतू आहे ना !
सर्व सौभाग्यवती मैत्रिणींना फोन करणे शक्य नाही, पण पुढच्या वेळी नक्की हं, असं मला हळूच कानात सांगितलं हो…
असा अनोखा व भन्नाट उपक्रम तिच्या कल्पनेतून आज साकार झाला, म्हणून तिच्यासाठी खास सप्रेम…
खरं तर देव माणसातच आहे, तो शोधण्याच्या तिच्या या अफलातून आयडियेच्या कल्पनेला मनापासून सलाम !
“…हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हीच अमुची प्रार्थना…
☆ अन्न सोहळा… लेखक : श्री सतीश बर्वे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे☆
त्या आडवाटेवर आमची गाडी अचानक बंद पडली होती. सूर्यास्त होण्याच्या मार्गावर होता. ड्रायव्हर निष्णात मेकॅनिक देखील होता त्यामुळे काळजीचं कारण नव्हतं. फक्त जास्त अंधार व्हायच्या आत आमचा पुढचा प्रवास सुरु होणं गरजेचं होतं.
दूरवर नजर टाकली तेव्हा तिथे टपरीवजा छोटंसं हाॅटेल दिसलं मला. बुडत्याला काडीचा आधार तसं उपासमार होणार नाही इतपत समाधान मला होते. ड्रायव्हरला सांगून मी आणि माझे दोन सहकारी टपरीच्या दिशेने चालायला लागलो.
टपरीवर पोहोचल्यावर वेगळंच दृश्य पाहायला मिळाले. दोन चार टेबलं आणि बाकडी ठेवली होती. त्यावर बसून गावातली माणसं डाळभात खात होती. त्यांच्या पोशाखावरून त्यांच्या कष्टकरी आयुष्याचा अंदाज येत होता. वाढलेला डाळभात खाऊन पत्रावळी उचलून रस्त्यालगत ठेवलेल्या मोठ्या डब्यात टाकून ती मंडळी टपरी बाहेर पडत होती. सगळं कसं शिस्तबद्ध पद्धतीने सुरू होतं. ते बघून मला आश्चर्य वाटलं.
आम्हाला बघून एक मुलगा पुढे येत आम्हाला म्हणाला, “काय खाणार साहेब? भजी, मिसळपाव, वडापाव, भुर्जी पाव. गरमागरम मिळेल सगळं.” हे ऐकून माझ्या जीवात जीव आला.
साहेब तुम्ही तिथे टेबल खुर्ची ठेवली आहे तिथे बसा. त्याने बोटाने दाखवलेल्या ठिकाणी आम्ही बसलो. आधी दोन प्लेट मिक्स भजी मागवली. ती खाताना माझी नजर सारखी डाळभात खाणाऱ्या लोकांच्या टेबलावर जात होती. शेवटी न राहवून मी खुर्चीवरून उठून तिथे पोहोचलो.
“काय झालं साहेब?” तो मघाचाच मुलगा पुढे येत मला विचारु लागला.
“ही डाळभात खाणारी माणसे कोण आहेत?”
“ते माझा बा तुम्हाला सांगेल” असं म्हणून त्या मुलाने त्याच्या वडिलांना बोलावून घेतले आणि मी काय विचारतोय ते त्यांना सांगितले.
एक साधारण पन्नाशीच्या आसपासचा माणूस आमच्या जवळ आला आणि मला म्हणाला, “राम राम साहेब. तुम्हाला जे बघून आश्चर्य वाटलं तो अन्न सोहळा रोज इथे सकाळ संध्याकाळ सुरू असतो.
“ ए आतून दोन तीन चांगल्या खुर्च्या आण बरं.” त्याने टपरीच्या दिशेने आवाज दिला. आतून आलेल्या खुर्चीवर आम्ही दोघे बसलो आणि तो माणूस सांगायला लागला.
” माझा जन्म इथूनच आत ४-५ किलोमीटर वर असलेल्या गावात झाला. माझे आई वडील कोण ते आठवत देखील नाही मला. उघड्यावरच जगायचो. कोणी चार घास दिले तर ते खायचो. नाहीतर पाणी पिऊन दिवस काढायचो.
माझ्या बा ला ह्या टपरीवर कोणीतरी हाताशी पाहिजे होतं. त्याने मला गावातून उचलून इथे आणला. त्या दिवसापासून तो माझा बा झाला. पडेल ते काम मी करायचो. पुढे पुढे किचनचं काम शिकून घेतले. माझ्या हाताला चव होती. सुरवातीला फक्त भजी आणि चहा विकणारा आबा नंतर मिसळपाव, वडापाव, भुर्जी पाव, नेसकाॅफी ठेवायला लागला.
इथे आसपास खाणीत आणि उसाच्या मळ्यात काम करणारे पुष्कळ कामगार आणि ट्रकवाले, ट्रॅक्टरवाले इथे यायला लागले. टपरी चोवीस तास उघडी असायची.
बा ला नंतर चांगले दिवस दिसले. माझं लग्न लावून दिलं त्यानं. बाने खुप गरीबी आणि उपासमारी बघितली. चांगले दिवस आल्यावर त्याने हा अन्न सोहळा सुरू केला. रोज सकाळी आणि संध्याकाळी इथे गरिबांना डाळभात आणि लोणचं देतो आम्ही खायला. त्याचे पैसे घ्यायचे नाहीत असं बा ने शिकवलंय मला.
‘आपल्यातले चार घास उपाशी माणसाला द्यावे हे बा ने शिकवलं मला. असं केल्याने आपण काही मरत नाही पण दुसऱ्याला जगण्याची ताकद मिळते’ असं समजावून सांगायचा मला तो. तो आजारी झाल्यावर माझ्याकडून वचन घेतले त्यांनी हा अन्न सोहळा पुढे चालू ठेवण्याचं.
आता मी आणि माझा मुलगा ही परंपरा पुढे चालवत आहोत.
बा म्हणायचा ‘नुसतं गोणीभर जमवून काही उपयोग नसतो. तर त्या पैशातून गरिबांना मदत करायला हवी आपण. देवाचं लक्ष्य असतं सगळ्यांकडे. आपण गरिबांना जमेल तेवढे सुखी ठेवलं की देव आपल्याला पण सुखी ठेवतो. एका हाताने दिलं की दुसऱ्या हाताने देव देऊन आपला तोल जाऊ देत नाही. नुसतं गोणी भरत गेलो की पैशाला पाय फुटतात आणि नको त्या रस्त्यावर आपण कधी जाऊन पोहोचतो ते आपल्याला कळत नाही. ज्या मातीशी आपण इमान राखत नाही त्याच मातीत आपलं जीवन आपण आपल्याच हाताने उद्ध्वस्त करतो.’
बा शिकला नव्हता. पण जगण्याच्या शाळेचा तो मास्तर मात्र होता. त्याने सुरू केलेला हा अन्न सोहळा जीवात जीव आहे तोपर्यंत मी चालू ठेवणार आणि माझ्या नंतर माझा मुलगा…. नंतर माझा नातू…..
गाडी दुरुस्त झाल्याचा निरोप आला. त्या माणसाचा निरोप घ्यायची वेळ आली. पाकिटातून हाताला लागल्या तेवढ्या नोटा काढून मी त्याच्या हातात ठेवल्या.
“साहेब हे काय?”
“अरे माझ्या कडून छोटीशी भेट तुझ्या अन्न सोहळ्याला. आज तु मला काहीतरी चांगलं शिकवून गेलास. जगण्याची किंमत त्यालाच जास्त चांगली माहीत असते ज्याला उद्या काय होणार ह्याची चिंता सतावत असते.
हा सोहळा तुझ्या हातून अखंड सुरू राहो हीच देवा जवळ प्रार्थना मी दररोज करीन. हे माझं कार्ड आहे. चुकून कधीतरी समजा वेळ आलीच ह्या सोहळ्यात खंड पडण्याची तर मला अवश्य फोन कर. मी असेन तुझ्यासोबत जमेल तेवढा हातभार लावायला.”
त्याने पाया पडून माझा आशीर्वाद घेतला आणि मी माझ्या सहकाऱ्यांसोबत गाडीच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली.
लेखक : श्री सतीश बर्वे
लेखक – श्री संदीप काळे
मो. 9890098868
प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “प्रत्यक्ष अनुभवलेले एक थरारनाट्य”☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆
आपल्या घराघरात आणि मनामनात चंदनाला एक अढळपद आहे. आमच्या गृहसंकुलात आपोआप उगवून आलेली चंदनाची झाडे आहेत. या भागात पक्षी खूप आहेत, बहुधा त्यांच्या शिटातून हे बीजारोपण झाले असावे.
चंदन हे नेहमी मोठ्या वृक्षांच्या जवळच जोमाने वाढते, कारण त्याचे अंशिक परावलंबित्व ! हा अर्धपरोपजीवी वृक्ष समजला जातो, कारण हा वृक्ष स्वतःचे अन्न पूर्णपणे तयार करू शकत नाही. तेव्हा तो दुस-या वनस्पतींच्या मुळांतून आपल्या मुळांच्या सहाय्याने अन्नशोषण करतो. (उदा. त्याला डाळिंब, कढीलिंब, काळा कुडा, करंज, अशा काही यजमानवृक्षांची सोबत मानवते.)
गेली वीस वर्षे अशा दोन चंदनवृक्षांचा सहवास आम्हाला लाभला. हे वृक्ष सदैव मण्याएवढ्या आकाराच्या फुला-फळांनी बहरलेले असतात. त्यावर सदैव मधमाशा असतात. ही फळे कोकीळ-कोकीळा, बुलबुल, फुलचुके, खारूताई आवडीने खातात.
काल ११ ऑक्टोबर २०२३/ बुधवार, रात्री बाराचा सुमार – इथे प्रगाढ शांतता होती. एकाएकी खालून आलेल्या एका विचित्र कर्णकटू कर्कश्श आवाजाने एकदम धडकीच भरली. या बाजूला अधूनमधून गाड्यांचे अपघात होतात. अति वेगात येणारी दुचाकी घसरून घसटत जावी, असे काहीसे वाटले. भराभरा गच्चीचे दार उघडून खाली डोकावले आणि पायाखालची जमीनच सरकली. आवाज रस्त्यावरून नव्हे तर चक्क संकुलाच्या आतूनच येत होता – यांत्रिक करवतीने एका चंदनवृक्षाचा बुंधा कापण्याचे काम चार माणसे मन लावून करत होती. मी आत येऊन खिडकीकडे धाव घेतली आणि सुरक्षारक्षकाला हाका मारल्या, ‘चोर, चोर’ म्हणून पुकारा केला. तोवर घरातील सर्व मंडळी आणि संकुलातीलही सर्वजण या विचित्र आवाजाने जागे होऊन या आरड्याओरड्यात सामील झाले. भराभर ब-याच मंडळींनी खाली धाव घेतली. पण, त्यांनी इमारतीचे प्रवेशद्वार उघडून बाहेर येऊ नये म्हणून पाऊस पडावा तसा दगडगोट्यांचा मारा करायला सुरुवात केली. दहा मिनिटात झाडाचा बुंधा कापून खांद्यावर टाकून चौघेही शांतपणे चालत मागच्या बाजूला असलेल्या टेकडीवरून निघून गेले.
तशातही संकुलातील काही धाडसी तरूणांनी बाहेर धाव घेतली. टेकडीवरून दगडांचा मारा चालूच होता. तिथे चोरांचे चार-पाच साथीदार दडलेले असावेत. संकुलातील पाच-सहाजण दगडांच्या मा-याने रक्तबंबाळ झाले. सुरक्षारक्षकाने हाकेला ‘ओ ‘ का दिली नाही, तर त्याच्या गळ्याला सुरा लावून त्याला दोघा चोरांनी दाबून धरले होते आणि मारहाण करून जखमी केले होते. काही सदस्यांनी गाड्या काढून या सर्वांना तातडीने दवाखान्यात नेले. सुरक्षारक्षक आणि आणखी एकाला टाके घालावे लागले. याचा अर्थ – ती ८-१० चोरांची टोळी होती. त्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे संकुलाची आणि झाडाच्या जागेची माहिती काढलेली होती.
हे एक मोठे बंगला-संकुल आहे. त्यात टेकडीच्या पायथ्याला आमच्यासारखी सदनिकांची संकुले आहेत. बंगलेवाल्यांनी टेकडीवर त्यांच्या बाजूपुरती आठ फूट उंचीची संरक्षक-भिंत घातली आहे. पण आम्हा सदनिकाधारकांच्या बाजूला फक्त दीड-दोन फूट उंचीची भिंत आहे, जी आरामात ढांग टाकून ओलांडता येईल. त्यावर काटेरी कुंपण आहे. पण ते कापून ये-जा करता येईल, अशी वाट चोरांनी काढली आणि मांजरपावलांनी संकुलात येऊन झाडापर्यंत पोहोचले. टेकडीवर चार चोर दगडगोटे, गलोल घेऊन दबून बसले होते, दोन चोरांनी सुरक्षारक्षकाची गठडी वळली होती आणि चारजण झाड कापून आरामात चालत निघून गेले. ८-१० जण एकूण नक्कीच होते.
हा रस्ता उताराचा आहे, आणि उताराच्या टोकाला एका विद्यमान माननीय मंत्रीमहोदयांचा बंगला आहे. तिथे एक छोटीशी पोलिसांची छावणीच आहे. हे थरारनाट्य अर्ध्या तासापेक्षा कमी वेळात संपले. आमचा हाकांचा सपाटा ऐकून पोलीस आले, तोवर चोरांचा कारभार संपला होता. मग येथील विभागीय पोलीस येऊन पहाणी करून त्यांनी तक्रार नोंदवून घेतली.
या विषयाने आणि चर्चेने रात्री किती तरी वेळ झोप येईना. मृत्युमुखी पडलेल्या चंदनवृक्षाने जीवाला चांगलाच चटका लावला. तेव्हा जाणीव झाली की, हा परिसर आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे आणि कुणीतरी विश्वासघाताने त्यातला एक भाग कापून काढला आहे.
थोर शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बसूंनी सप्रमाण सिद्ध केले होते की, वृक्षसंपदा सजीव आहे आणि भावभावनांनी युक्त आहे. त्या वृक्षाच्या आणि अवतीभोवतीच्या त्याच्या सहचरांच्या मूक आक्रंदनाने मन विषण्ण होऊन गेले. कालची काळरात्र संपली. सकाळ झाली. नेहमीसारखे पक्ष्यांचे कलरव ऐकू येईनात. गच्चीकडे धाव घेतली – एक वेडी आशा की कालची घटना हे स्वप्न असावे. पण कुठले काय? त्या सुंदर हिरव्या विणीला भले मोठे भगदाड पडले होते आणि त्यातून भक्क आभाळ भगभगीत नजर वटारून थेट समोर ठाकले होते….
घरात कोणी पाहुणे आले की घराला आनंद होतो, घर खुश होतं असं मला वाटते ! घराचे घरपण हे माणसांमुळे असते आणि येणारा पाहुणा जर हवाहवासा वाटणारा असेल तर घर अधिकच आनंदित होतं ! तसं आज झालं !
रोजचा दिवस ” रंग उगवतीचे” सदराने आनंदमय करणारे लेखक श्री. विश्वास देशपांडे सर आणि त्यांच्या पत्नी, सौ श्रद्धा ताई देशपांडे आज आमच्या घरी सकाळच्या ब्रेकफास्टसाठी आले. अर्थातच त्यांच्या येण्याने चैतन्यमय वातावरणात गप्पा सुरू झाल्या. नाश्त्यासाठी इडली, सांबार, चटणी, रव्याचा लाडू असा साधाच मेनू होता. सौ. श्रद्धा वहिनींचा उपवास असल्याने फळे, कॉफी वगैरे होते. पण या सर्वांपेक्षा त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकांबद्दल अधिक उत्सुकता होती. त्यांची नुकतीच प्रकाशित झालेली
” चांदणे शब्द फुलांचे “, “ अजूनही चांदरात आहे “ आणि “ आनंद निधान “ ही पुस्तके मी घेतली.. आता प्रत्यक्ष वाचेन तेव्हा त्यावर काही लिहिता येईल. त्यांच्या आधीच्या प्रकाशित झालेल्या “ अष्टदीप “ ह्या पुस्तकाची प्रत ही आत्ताच माझ्या हातात आली. त्यातील प्रत्येकाबद्दल माहिती असली तरी सरांच्या दृष्टिकोनातून या सर्व थोर व्यक्तींबद्दल चांगले वाचायला मिळणार आहे याची खात्री आहे.
रंग उगवतीचे सदर सुरू होऊन तीन वर्षे पूर्ण झाली हे पटतच नाही ! अरेच्चा, आत्ताच तर सुरू झालं हे सदर ! हे सदर इतकं नाविन्यपूर्ण असते की रोजचा रंग नवा ! सरांना विषय तरी इतके सुचतात की, ‘ साध्या ही विषयात आशय मोठा किती आढळे !’ याचा प्रत्यय ते लेख वाचताना येतो. सरांचा आणि माझा परिचय गेल्या तीन वर्षातला ! माझ्या ” शिदोरी” या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मी त्यांना आमंत्रित केले आणि त्यांनी ते मान्य करून आमच्या कार्यक्रमाला शोभा आणली. अतिशय मृदू स्वभाव, सावकाश शांतपणे बोलणे, चांगली निरीक्षण शक्ती ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. लेखनातील सच्चेपणा, साधी सरळ प्रवाही भाषा, यामुळे वाचकांशी त्यांना ‘या हृदयीचे त्या हृदयी’ असा संवाद साधता येतो. व्यक्तिचित्रण कोणतेही असो, साध्या कामगाराचे असो किंवा मोठ्या व्यक्तीचे, त्यातील बारीक-सारीक तपशीलही त्या लेखात येतात, आणि ते चित्रण मनाला भावते ! वेगवेगळ्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे, पण वाचकांचे प्रेम, आपुलकी मिळणे हा मोठा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे !
प्रथमतः मी सरांचे ” रामायण महत्त्व आणि व्यक्ती विशेष “ हे पुस्तक वाचले होते. रामायण आपणा सर्वांना परिचित आहेच, परंतु देशपांडे सरांनी ते अभ्यासपूर्ण लेखातून चांगले सादर केले आहे. त्यामुळे रावण असो वा मंदोदरी, प्रत्येक व्यक्ती-रेखा छान, वास्तव अशी लिहिली आहे. अशा या व्यक्तिमत्त्वाविषयी मला आदर आहे. यंदा त्यांना तितीक्षा इंटरनॅशनल चा पुरस्कार मिळाला आहे. या मान्यवर लेखकाचे स्वागत करताना स्वाभाविकच मला खूप आनंद मिळाला. देशपांडे सर आणि सौ. श्रद्धा वहिनींच्या सहवासात घालवलेला हा वेळ संस्मरणीय राहील, त्याची साक्ष हा त्यांच्यासोबत काढलेला फोटो देत आहेच !
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ असेही एक देवीपूजन… भाग-२☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
पाचवा दिवा –
ज्या महिलांना भीक मागणं सोडायचं आहे, अशा महिला माझ्याकडे काम मागत आहेत
मी गाडगे बाबांचा भक्त आहे, गाडगेबाबांचे विचारसरणीला अनुसरून आम्ही अशा सर्व महिलांची एक टीम तयार केली आहे, या टीमला “खराटा पलटण” असं नाव दिलं आहे
या माध्यमातून या महिन्यात पुण्यातील वेगवेगळे भाग स्वच्छ करवून घेऊन त्यांना पंधरा दिवस पुरेल इतका किराणा दिला आहे ..कपडे दिले आहेत ….याव्यतिरिक्त त्यांच्या इतर गरजा सुद्धा भागवल्या आहेत. !
आमच्या या टीमला पुणे महानगरपालिकेने स्वच्छता अभियान चे ब्रँड ॲम्बेसिडर केले आहे, यांच्यासाठी सन्मानाची गोष्ट !
या सर्व आज्या आणि मावश्या झोपडपट्टी किंवा पुलाखाली राहतात.
अशा सर्व आज्यांच्या घरी झोपडपट्टीत जाऊन आम्ही दिवा लावला आहे… म्हणुन मंदिरात यायला आम्हाला वेळच मिळाला नाही देवी…. !
यासाठी मी तुझी माफी मागणार नाही…. किंवा तू माफ करावंस अशी अपेक्षा सुद्धा ठेवणार नाही….
कारण तू हल्ली मंदिरात राहत नाहीस, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे…. आणि तू जर रोज आम्हाला रोज रस्त्यांवर दर्शन देत आहेस… तर मी कशाला येऊ मंदिरी ???
सहावा दिवा –
ज्यांना विविध प्रकारचे गंभीर आजार होते अशा रुग्णांना, दवाखान्यात ऍडमिट करून उपचार केले. डोळे ऑपरेशन करून चष्मे दिले, दिव्यांग व्यक्तींना काठ्या कुबड्या आणि लागेल ते इतर वैद्यकिय साहित्य दिले.
आमच्या परीने आम्ही असा नैवेद्य अर्पण केला.
सातवा दिवा –
हे नऊ दिवस लोक अनवाणी पायाने रस्त्यावर चालतात….!
माझ्या भीक मागणाऱ्या समाजाचे लोक वर्षानुवर्षे, अनवाणी पायाने चटके सहन करत जगत आहेत…
मग यांच्या पदरात अजुन पुण्य का नाही मिळाले ? याचा विचार करत आम्ही हि प्रथा बदलली….
या नवरात्रात ज्यांच्या पायी चप्पल नाही, अशा सर्वांच्या पायी चप्पल घातली… !
माते तुला हे आवडलं नसेल, तर माझ्या तोंडात चप्पल मार, पण यांच्या पायी मात्र चप्पल राहू दे, उन्हात खूप पाय भाजतात गं…. !!!
आठवा दिवा –
ज्यांनी आयुष्यभर पोरांच्या अंगावर मायेची चादर पांघरली, परंतु आता जे रस्त्यांवर आहेत, अशा रस्त्यावरील सर्व आई बापांना, येणारे थंडीचे दिवस लक्षात घेवून गरम शाली आणि इतर कपडे दिले आहेत.
नववा दिवा –
अनेक महिलांकडे अनेक प्रकारचे कला कौशल्य असते, या कला कौशल्याचा वापर करून यांना आणखी प्रशिक्षण देऊन, त्यांच्याकडून वस्तू तयार करवून घेऊन आपण त्या विक्री करणार आहोत
आणि येणारा पैसा हा सर्व त्या महिलांना जाईल, असा विचार करत आहोत.
अनेक भिक मागणाऱ्या महिलांना यामुळे एकाच वेळी व्यवसाय उपलब्ध होईल आणि त्या त्यांची घरं चालवू शकतील….
यांना प्रशिक्षण देण्यासाठी, एका जागेची सोय करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत…. परंतु आम्हाला अजून कोणतीही जागा मिळालेली नाही.
कामाचं खूप कौतुक होतं… अवॉर्डस मिळतात … सर्टिफिकेट मिळतात….
परंतु अवॉर्ड आणि सर्टिफिकेट ने आपण दुसऱ्याचं पोट नाही भरू शकत बाबा,’ हे माझ्या माईनं (आदरणीय सिंधुताई सपकाळ यांनी) माझ्या कानात खूप पूर्वीच सांगितलं होतं…!
असो….काहीतरी होईलच… हा नववा दिवा राखून ठेवलाय, त्या प्रशिक्षणाच्या जागेसाठी …!
पोराच्या जेवणाचा विचार करते ती आई….परंतु पोराच्या जीवनाचा विचार करतो तो बाप…!
मला जे दिसते ते माझ्या पोराला सुद्धा दिसावं म्हणून जमिनीवरून कडेवर उचलून घेते ती आई…!
पण मला जे दिसतंय, त्यापलीकडचं पोराला दिसावं म्हणून, पोराला डोक्यावर उचलून घेतो तो बाप…!!
आपण सर्वजण समाज म्हणून आमची कधी आई झालात तर कधी बाप झालात…. !!
आमच्यावर प्रेम आणि माया करतांना, तळागाळातल्या समाजाला समरसून मदत करताना, आपण सर्व सीमा ओलांडल्या…!
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ असेही एक देवीपूजन… भाग-१☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
ऑक्टोबर महिना…. ! अर्थात भाद्रपद अश्विन…,,!!
या महिन्यात देवीची प्रतिष्ठापना झाली…. !
तिथून पुढे नऊ दिवस देवीच्या पूजनाचे नवरात्र म्हणून मनापासून स्वागत केले जाते…. !
आपली आजी, आई, बहीण, मुलगी, सुन, नात, आत्या, मावशी आणि पत्नी…. ! आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असलेल्या याच त्या दुर्गा माता…. !!!
यांच्यापुढे ताट घेऊन आरती करणे, उदबत्ती लावणे, कापूर लावणे, नारळ फोडणे आणि साडी अर्पण करणे म्हणजेच यांची पूजा…. असं नाही…. !
या माता भगिनींना आनंद वाटेल, समाधान वाटेल, मुख्य म्हणजे सन्मान मिळेल अशी कोणतीही गोष्ट करणे म्हणजे तिची पुजा…. !!!
आईचा खरबरीत हात हातात घेऊन, तिच्या पदराला हात पुसत, दुसऱ्या हाताने तिच्यापुढे जेवणाचं ताट ठेवत, पायाशी बसून तिची चौकशी करणे ही त्या आईची पूजा….!
काय म्हातारे जेवलीस का ? म्हणत काशाच्या वाटीने खोबऱ्याचं तेल भेगाळलेल्या पायावर चोळून लावणं… ही त्या आजीची पूजा… !
येडी का खुळी? इतकं कामं कुटं एकटीनं करायचं असतात होय येडे…. ! मी कशासाठी आहे… ? मला पण सांगत जा की गं बाय म्हणत, तिच्या खांद्यावर हात ठेवणे ही त्या बायकोची पूजा…. !!
अय झीपरे, हितं आमच्या फरशीवर नको उड्या मारू…. तिथं आभाळात जाऊन झेप घे… तिथं काय अडचण आली तर मला हाक मार… मोठया भावाची ही दोन वाक्य, म्हणजेच बहिणीची केलेली पूजा…. !!!
आम्ही नवरात्री साजऱ्या केल्या नाहीत… पण अक्षरशः आम्ही “नव रात्री” जगलो…. !
पहिला दिवा –
अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून रस्त्याकडेला पडलेल्या “निराधार” आईंच्या हातात जेवणाचं ताट ठेवलं… … यांना निराधार तरी कसं म्हणावं ? यांना मुलं बाळं सुना नातवंडं सर्व आहेत…. पण, जबाबदारी घ्यायला कुणी तयार नाही….!
बरोबर आहे, आंबा खावून, कुणी कोय जपून ठेवतो का ?
आयुष्यभर आई बापाचा गोडवा पातेल्यात खरवडून घेतल्यावर शेवटी उरतंच काय ? कोयच ना ??
…. असो, लोकांनी उकिरड्यात फेकलेल्या या कोयी आम्ही साफ करून परत जमिनीत रुजवत आहोत… खत पाणी घालत आहोत….
…. आम्हाला फळं नकोच आहेत. एक झाड जगलं, हेच आमच्यासाठी खूप आहे….!
दुसरा दिवा –
फाटक्या साडीत, रोज नवं आयुष्य जगणाऱ्या आज्ज्यांना आणि महिलांना नव्या कोऱ्या साड्या दिल्या… एक? दोन ?? तीन??? नाही… तब्बल १३४१ …!!!
पूर्वी भीक मागणाऱ्या ज्या माता भगिनींनी भीक मागणे सोडून आता काम करण्याची तयारी दाखवली आहे, अशा माता भगिनीचे पाय धुवून… पूजन करून त्यांना साड्या दिल्या आहेत.
या उपक्रमातून त्यांचे मनोबळ आणखी वाढेल… त्यांचे समाजात कौतुक होईल आणि भीक मागणाऱ्या इतर माता भगिनीना सुद्धा काम करण्याची प्रेरणा मिळेल हा या उपक्रमाचा हेतू आहे.
या उपक्रमात आम्हाला अनेकांनी मदत केली, पण मला कौतुक वाटले ते सौ.अनुश्रीताई भिडे आणि भिडे काका यांचे …. ज्यांच्या दहा फुटावर सुद्धा कोणी उभे राहणार नाही, अशा माझ्या भीक मागणाऱ्या लोकांचे पाय यांनी तबकात घेऊन धुतले…
… कुठुन येतं हे…? कसं येतं…?? आणि का ??? काय मिळत असेल यांना…????
या प्रश्नांची उत्तरे शोधत वेळ घालवण्यापेक्षा, मी अनुश्री ताई आणि भिडे काका यांचे पाय धुऊन तीर्थ प्राशन केले…!
तिसरा दिवा –
भीक मागणे सोडलेल्या, परंतु शिक्षणाची वाट धरलेल्या “कुमारिकांचे” या नवरात्रात पाय धुवून पूजन केले. पूजन करण्यामागे, या मुलींचे कौतुक करणे आणि इतर मुलींना शिकण्याची प्रेरणा मिळावी हा हेतु होता.
सौ सुप्रियाताई दामले, हिंदु महिला सभा, पुणे यांची ही संकल्पना होती…!
आम्ही या सर्व मुलींना शैक्षणिक साहित्य देऊन सरस्वती पूजन केले.
संस्थेने माझ्या मुलींना ड्राय फ्रूटस दिले, मनोभावे त्यांचे कौतुक केले.
…… मी आणि मनीषा बाजूला फक्त उभे राहून, आमच्या लेकींचे होणारे कौतुक पाहत होतो…!
आई आणि बापाला अजून काय हवं ?
माझ्या पोरींना ड्राय फ्रूट मिळाल्यावर, त्या पोरींनी तो पुडा फोडून मला आणि मनीषाला ड्राय फ्रूटचे घास भरवले…. आणि काय सांगू राव…. हे “ड्राय” फ्रूट अश्रुंनी “ओले” होवून गेले… !!!
चौथा दिवा –
ज्या ताईंना कोणाचाही आधार नाही, अशा ४ ताईंना याच काळामध्ये नवीन व्यवसाय सुरू करून दिले… !
गणेश हॉटेल समोर, शिवाजीनगर कोर्ट पुणे, येथे यातील अनेक ताई रस्त्यावर किरकोळ वस्तू विक्रीचा व्यवसाय करत आहेत…!!!
घुसमटलेल्या चार भिंती मधून या महिला बाहेर येऊन स्वतःच्या पायावर सन्मानानं उभ्या आहेत.
हरलेल्या या माता परिस्थितीच्या नरड्यावर पाय देऊन पुन्हा उभ्या राहिल्या आहेत, आणि आमच्यासाठी त्यादिवशीच विजयादशमी होती!!!