आपले दु:ख, तेवढ्या मोठ्या मात्रेचे नसतांना अचानक कुणीतरी मोठ्या मात्रेने सांत्वन करायला पुढे आले की, थोडे गोंधळायला होते. हे सात्वंन झिडकारावे की त्यामागचा आपलेपणा पाहून नम्रपणे स्वीकारावे ? अशा संभ्रमात पडायला होते खरे… बागेतल्या पिंपळाला असेच काहीसे त्यादिवशी झाले.
बागेतले आंब्याचे झाड त्याला सांगत होते, “बघवत नाही रे तुला पिंपळा.. शिशिर ऋतूने तुला अगदीच पर्णहीन, निस्तेज करून टाकलय. पण धीर धर. काही दिवसाच वसंत सुरू होईल आणि येईल पुन्हा पालवी…. होईल पुन्हा पूर्वीसारख रूप … होशील माझ्यासारखा…”
शिशिरात पर्णहीन अवस्थेत नीरव शांततेतली आनंददायी ध्यानावस्था अनुभवणाऱ्या पिंपळाला यावर काय बोलावे, हे क्षणभर समजेना. अनेकदा दुसऱ्याचे सांत्वन करतांना त्याचा दुःखभार हलका करण्याच्या हेतुपेक्षा, आपण खूप सुखात आहोत याचा काकणभर का होईना अभिमान दाखविण्याचा हेतू सांत्वन करणाऱ्याच्या मुखावर झळकत असतो. पण हा हेतू दिसला तरी त्यावेळी तसे बोलता येत नाही, याची समज आणि उमज पिंपळाला होती.
मंद स्मित करून पिंपळ आब्यांला म्हणाला, “तुझ्या प्रेमळ शब्दांसाठी खूप आभार. पण एक सांगू.. मी अजिबात दु:खात नाही. सृष्टीने सहाही ऋतूत आपले प्रारब्ध आधीच लिहून ठेवले आहे. कोणत्या झाडाने केव्हा फुलावे, बहरावे, कोमेजावे सगळे सगळे. आपल्या हातात फक्त मूळं आहेत आणि त्यांच्या व्दारे जमिनीतून जीवनरस घेणे आहे.हे एकदा उमगले की दुःखाचा लवलेश नाही”
“आपली मूळं आत सारखीच आहेत. फरक दिसतो, तो फक्त बाहेर.. जमिनीवर… पाने, फळे, फुले, खोड, उंची यात फक्त फरक. विविधता आणि सौंदयासाठी केलेला… हे एकदा कळलं की, आहे त्यात आनंद.
सुखदुःखापलीकडील समाधानाचा, आनंदाचा अनुभव. आपल्या बाहयरूपातल्या बदलांकडे पहाण्याची एक वेगळीच दृष्टी येते… एक समाधानी अवस्था येते. जिथे कुणाशीही तुलना नाही, तक्रार नाही. ठेविले अनंते तैसेचि रहावे। चित्ती असो द्यावे समाधान।”
पिंपळाच्या या बोलण्याने आंब्याचे समाधान झाले नाही. त्याने पिंपळाला विचारले, “खरे खरे सांग! पर्णहीन झाल्याने तुझं रूप कुरूप झालय, पक्षी येईनासे झालेत, पानांची सळसळ नाही… याचे खरेच तुला दुःख नाही?”
धीरगंभीर आवाजात पिंपळ उत्तरला, ” नाही. अजिबात नाही. बाहेरच्या बदलणाऱ्या गोष्टींशी आपल्या सुखाला जोडून घ्यायचं आणि त्या गोष्टी बदलल्या की दुःखी व्हायचं, ही माणूसं करीत असलेली चूक आपण का करायची! माझं सद्भाग्य की, तथागताचा सहवास मला लाभला आणि पानं, फुलं, फळ
यापलीकडे जाऊन कायम मूळाकडेच पाहण्याची खोड मला जागली. ‘घट्ट मूळ’ आणि ही ‘खोड’ असली की आनंदाला बाधा नाही. बाह्य बदलांकडे पाहण्याची दुष्टीच बदलून जाते”
“‘तू म्हणतोस पाने नाहीत त्याचं दुःख. पण खरं सांगू शिशिर ऋतू माझा ५-६ हजार पानांचा भार हलका करतो. ते २-३ महिने खुप हलकं हलकं वाटत! तू हे सुख नाही अनुभवू शकत.. पानांचा भार नाही.
सळसळ नाही, पक्षांचे आवाज नाही. त्यामुळे ध्यान समाधीही दीर्घकाळ लावता येते. अधिक मूळाकडे जाऊन चैतन्याचा स्रोत देहभर भरून घेता येतो. वसंताला सामोरे जाण्याची ही पूर्व तयारी असते. म्हणूनच वसंत आला रे आला की अवघ्या सात दिवसात माझ्या देहभर पालवी फुललेली दिसते “
आंब्याला हळूहळू पिंपळाचे विचार पटत होते. पिंपळ पुढे बोलू लागला.” कुणाला आपण किती प्रिय आहोत, यावर आपण आपली प्रियता ठरवू नये. तुझाही मोहोर कधी जळतो.. कधी गळतो.. फळं नाही येत तेवढी… लोकं नाराज होतात.. फळांच्या अपेक्षेने प्रियता, जवळीकता असली की ती कधीतरी लोप पावते. पण फळाची अपेक्षा न ठेवता निरपेक्ष प्रेम केलं की प्रियता कायम रहाते. अशा निरपेक्ष प्रेम करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या प्रेमाची आठवण म्हणून त्यांच्या वहीत, पुस्तकात पिंपळपान कायमचं ठेवतात. शिशिरात देहावरची पाने गळाली तरी ती वह्या-पुस्तकातील पाने तशीच असतात. त्यांना बघून मी धन्य होत असतो.”
आपल्या फळाला बाजारात मोठा भाव / प्रसिध्दी आहे, अशा समजूतीत असणाऱ्या आंब्याला पिंपळ आपल्याहून जाणीवेने, विचाराने खूप मोठा आहे, हे एव्हाना जाणवले होते. पिंपळाप्रती आदरभाव, कौतुक व्यक्त करावं म्हणून आंबा पिंपळाकडे वळला तर काय? पिंपळ डोळे मिटून ध्यानस्थ झाला होता. पर्णहीन पिंपळाचं झाड आंब्याला त्याच्याहून सुंदर दिसलं..समाधानी जाणवलं…आणि मूळाकडे जायची खोड लावून घेण्याचा निश्चय त्याने मनोमन केला.
“ लेकरा माझ्या आगमनाची तयारी सुरू केलीस म्हणून आधीच तुला भेटायला आले ..मी येणार म्हणून तुला काय करू काय नाही असं होतं… त्याचं मला समाधान वाटतं… पण खूप काम करून दमून नको जाऊस.. सण साजरा करताना त्यातला आनंद घ्यायला शिक.
आता लेकी बाळी नोकरी करणाऱ्या दिवसभर काम करणाऱ्या असतात. त्याच घराची खरी लक्ष्मी आहेत हे विसरू नकोस… त्या आनंदात असतील तर घर सुखात असतं…
उगीच स्वतःचा मोठेपणा दाखवायला जाऊ नकोस. हे केलंच पाहिजे ते केलंच पाहिजे असं म्हणत बसू नकोस. त्यांनी काही बदल सुचवला तर बदल कर .. आणि बदल करताना मनात भीती नको ग ठेवूस… माझ्यावर प्रेम करतेस ना मग मला भ्यायचं कशाला ……आपल्या घराण्यात अशीच परंपरा आहे ….हे पालुपद तर अजिबात लावू नकोस….पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. घरात खाणारी माणसं होती. आता तसे नाहीये हे लक्षात घे.
माझ्यासाठी हे करतेस ना…. मनातल एक खरं सांगू …
… मला हे काही नको असतं ग…
आल्या दिवशी तू केलेल्या भाजी भाकरीवर मी तृप्त असते…
घरोघरी जाऊन तुम्ही सर्वजण सुखात आहात… हे मला बघायचं असतं…. तुमच्याशी बोलायचं असतं..
मायेनी प्रेमानी त्या ओढीनी मी येते ग….घडीभर माझ्याजवळ नुसती बसत जा …मला बरं वाटेल बघ..
डेकोरेशनच्या गडबडीत पहिला दिवस जातो. दुसऱ्या दिवशी जेवणाची गडबड..
हो आणि अजून एक सांगायचे आहे … करायलाच हव्यात म्हणून भाज्या कोशिंबिरी भजी वडे सगळं करतेस.. संपत नाही ग सगळं… मग राहिलेल्या अन्नाचं काय करतेस ते आठव बरं….
हे योग्य आहे का ?
शेतकरी बिचारा राब राब राबतो त्या अन्नाचा आदर कर… आणि संपेल इतकंच कर..
चार पदार्थ कमी केले म्हणून बाळा मी तुझ्यावर रागवेन का ग कधी ….
मला ओळखतेस ना तू …मग आता शहाणी हो …
खेड्यात काहीजण राहिलेलं अन्न गाईला घालतात … पण गायी त्या शिळ्या अन्नाला तोंड लावत नाहीत…
फार नासाडी होते ग अन्नाची …बघवत नाही म्हणून आधीच तुला समजावून सांगायला आले आहे
सणाची मजा घे…
हसत आनंदात सण साजरा कर…
यावेळेस फार छान साडी घेतली आहेस माझ्यासाठी… आवडली बरं का…
आणि सुनबाईनी घेतलेलं नव्या पद्धतीचं गळ्यातलं झकासच…
.. .. आता सजून घ्यायला आणि तुम्हा सगळ्यांना भेटायला येते की….
आणि हे बघ आईच ऐकायचं…. आईचा लेकीला सांगायचा हक्कच असतो ना… म्हणून बाळा प्रेमानी सांगतीये …… तशी तू समजूतदार शहाणी आहेसच
☆ दि लास्ट एम्परर… भाग-२ – लेखक : श्री राज ठाकरे ☆ श्री सुनीत मुळे ☆
(याच चित्रपटातली ‘अब के बरस भेज भैया को बाबूल’ आणि ‘ओ पंछी प्यारे’सारखी दोन अतिशय मोहक, मधाळ गाणी आशाताईंनी गायली आहेत. या गाण्यांना दुय्यम म्हणायची हिंमत कोणी करील का?) – इथून पुढे —
‘कारवाँ’ या चित्रपटाचं उदाहरण घ्या ना, तिथं नायिकेवर म्हणजे आशा पारेखवर चित्रीत झालेलं ‘दैया ये मैं कहां आ फसी’ हे गाणं आशाताईंनी गायलं आहे आणि अरुणा इराणीवर चित्रित झालेलं ‘दिलवर दिल के प्यारे’ हे गाणं दीदीचं आहे. अशी बरीच उदाहरणं देता येतील. ज्या सातत्यानं आशाताई गाणी गात राहिल्या, ते तर अफाट आहे, विस्मयजनक आहे.
‘उमराव जान’ हा चित्रपट म्हणजे आशाताईंचा अक्षरशः पुनर्जन्म होता. त्यांच्या कारकीर्दीचा मोठा आणि यशस्वी टप्पा तोवर होऊन गेला होता. एक प्रकारचा ठहराव त्यांच्या कारकीर्दीत आला होता. त्याच सुमारास अचानक ‘उमराव जान’ आला. दीदी त्यांच्या स्थानी अढळ होत्याच; तरीही संगीतकार खय्याम यांच्या ‘उमराव जान’नंतर आशाताईंच्या गायकीला, लोकप्रियतेला मिळालेली झळाळी अभूतपूर्व होती आणि अगदी या क्षणापर्यंत ती उंची तशीच कायम आहे.
मी ‘प्रभुकुंज’समोरून जातो, तेव्हा मनात येतं, की भारताचा सांगीतिक इतिहास लिहायचा म्हटलं, तर या इमारतीच्या एकाच मजल्यावर किमान २५ हजार गाणी आहेत. काजव्यांनी लगडलेलं एखादं झाड असावं, तशी ही इमारत गाण्यांच्या लखलखत्या सुरांनी लगडलेली आहे. असा चमत्कार जगात कुठं तरी असेल का? साक्षात प्रभूचंच तिथं वास्तव्य आहे, असं म्हणायला हवं. या सगळ्या पुरुषप्रधान उद्योगामध्ये या दोन बायकांनी अक्षरशः राज्य केलं. देश पातळीवर असा दरारा असणाऱ्या केवळ तीनच स्त्रिया मी पाहिल्या आहेत. एक लता मंगेशकर, दुसऱ्या आशा भोसले आणि तिसऱ्या इंदिरा गांधी.
एस. डी. आणि आर. डी. यांची बरीच गाणी ईशान्य भारतातील लोकगीतांवर बेतलेली आहेत. तिथल्या पारंपरिक संगीताचं सौंदर्य या दोघांनी हिंदी गाण्यांत अतिशय नजाकतीनं ओतलं आहे. ‘हम दोनों दो प्रेमी दुनिया छोड चले’ हे ‘अजनबी’मधलं गाणं ऐकून बघा किंवा ‘हरे राम हरे कृष्ण’मधलं ‘कांची रे कांची रे’ ऐकून बघा. अशा खूप चाली तयार झाल्या असतील. आपण त्या दीदी किंवा आशाताईंच्या आवाजात ऐकतो, तेव्हा मूळ चालींचं ते वेगळंच रूप असतं. मूळ ट्यूनपासून केवळ स्फूर्ती घेतलेली असते, बाकीची निर्मिती संगीतकाराची असते, गायक ते अधिक फुलवतो.
‘बाळासाहेब म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासमोर दोन केवढे सक्षम पर्याय होते. एखादं गाणं दीदीला द्यावं, की आशाताईंना असा त्यांना प्रश्न पडत असेल,’ असं लोक अनेकदा म्हणतात; परंतु मला त्याहीपेक्षा पंचम यांचं जास्त कौतुक वाटतं. आशाताई तर त्यांच्या पत्नी होत्या; परंतु त्यांनी किती बरोब्बर वाटणी केली आहे बघा गाण्यांची. दीदींचं गाणं दीदींना, आशाताईंचं आशाताईंना. ‘हमशक्ल’ नावाचा चित्रपट होता, राजेश खन्ना आणि तनुजाचा. तनुजा वेडी असते आणि तिला वेड्यांच्या रुग्णालयात ठेवलेलं असतं. त्यातलं गाणं आहे, ‘देखो मुझे देखो, कैसी मैं दिवानी हूँ’ हे गाणं ऐका. त्या गाण्याची स्केल बघा. एक तर पंचम यांनी ते बसवलंच खूप वेगळं आणि आशाताईंनी काय गायलंय बघा. व्यक्तिरेखा ‘वेडी’ आहे, तो वेडेपणा सुरांमधून बरोब्बर थ्रो करायचा, म्हणजे काय आव्हान होतं! त्यात सुरुवातीला आशाताई अगदी एखाद्या वेडीसारखं हसल्यादेखील आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या कडव्याची चाल पूर्ण वेगळी आहे. वरच्या पट्टीतून थेट खालच्या पट्टीत गाणं येतं; पण आशाताईंनी ते सहजपणे पेललं आहे. ‘जवानी दिवानी’मधल्या ‘जाने जां ढूंढती फिर रहीं हूँ’मधले चढ-उतार ऐका. ‘ज्वेलथीफ’मधलं ‘रात अकेली है’ ऐका. ‘अनहोनी’ या चित्रपटातल्या ‘मैने होठों से लगाई तो हंगामा हो गया’ यातली मदहोशी अनुभवा. राजेश रोशन यांनी संगीत दिलेल्या ‘मिस्टर नटवरलाल’मधलं ‘आनेवाला, आयेगा आनेवाला’ बघा. त्या गाण्यात केवढे चढ-उतार आहेत. ही गाणी ऐकल्यावर मग तुम्ही थेट ‘ज्यूली’मधलं राजेश रोशननं संगीत दिलेलं भजन ऐका, ‘सांचा नाम तेरा…’ काय जबरदस्त भजन आहे. त्यात सोबत उषाताईही आहेत. या गाण्यात आशाताईंचा आवाज भक्तीरसात अगदी ओथंबलेला आहे. ही रेंज कल्पनातीत आहे.
आशाताईंना खाण्याची आणि खिलवण्याची आवड आहे. एकदा मी आशाताईंच्या घरी जेवायला गेलो होतो. संपूर्ण टेबल वेगवेगळ्या पदार्थांनी भरलं होतं. लॉबस्टर, प्राँझ, बांगडा, पापलेट, मटण, चिकन, बिर्याणी… तुम्ही नाव घ्या, तो पदार्थ टेबलवर होता. मी विचारलं, ‘आणखी कोण कोण आहेत जेवायला?’ त्या म्हटल्या ‘तुम्ही एकटेच आहात.’ मी हसून विचारलं, ‘अहो आशाताई, मला काय भस्म्या लागला का?’ तर मला म्हणाल्या, ‘सगळं खाऊ नका; पण सगळं खाऊन बघा. प्रत्येक पदार्थाची फक्त चव बघा.’ त्या दिवशी मला सुगरण या शब्दाचा खरा अर्थ कळला. गाणं असो की खाणं, प्रत्येक गोष्ट आशाताई जीव ओतून करणार. त्या साक्षात शारदा आहेत आणि साक्षात अन्नपूर्णही आहेत!
‘पुलं’चंच एक वाक्य आहे, ते सखाराम गटणेला म्हणतात, ‘करोडो लोकांमधून एक असा जन्माला येतो, ज्याच्या आयुष्याला जीवन म्हणतात. बाकीच्यांचं फक्त आयुष्य असतं.’ दीदी आणि आशाताई यांच्या जगण्याला जीवन म्हणतात. त्यांनी आपलं आयुष्य त्यांच्या गाण्यांनी समृद्ध केलं, सुसह्य केलं. त्यांना नव्वदी निमित्त त्रिवार शुभेच्छा !
– समाप्त –
लेखक : श्री राज ठाकरे
प्रस्तुती – श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ दि लास्ट एम्परर… भाग-१ – लेखक : श्री राज ठाकरे ☆ श्री सुनीत मुळे ☆
‘प्रभुकुंज’मध्ये मी एकदा ‘विम्बल्डन’ची एक जबरदस्त मॅच पाहिली होती. मी आणि लतादीदी सोफ्यावर गप्पा मारीत बसलो होतो. तेवढ्यात समोरून मीनाताई आल्या. आमच्या गाण्यांबद्दलच्या गप्पा ऐकून त्याही बसल्या. मग ‘अगं दीदी, ही हरकत अशी नाही, अशी आहे’ वगैरे त्या सांगू लागल्या. इतक्यात उषाताई आल्या, त्या गप्पांत सामील झाल्या. या गप्पा सुरू असल्याचं पाहून हृदयनाथजी आले आणि तेही गाण्यांबद्दल अधिक माहिती देत सामील झाले. मग दीदींनी ‘अरे बाळ. ते गाणं कुठलं’ वगैरे विचारणं सुरू झालं. वेगवेगळ्या गाण्यांच्या आठवणी निघू लागल्या, त्या गाण्यांचे मुखडे गायले जाऊ लागले, गाण्यांची बरसात सुरू झाली आणि त्याच क्षणी समोरून आशाताई आल्या. आशाताई आल्यावर त्या गप्पांची लज्जत अशी काही वाढली, की मला ऐकायला दोन कान कमी पडू लागले. माझ्यासाठी तर रॉजर फेडरर, नदाल, जोकोविच, अँडी मरे, बोर्ग, बेकर हे सगळे जणू एकाच वेळी खेळत होते. ‘दीदी, हे गाणं तसं नाही गं’, ‘आशा, ही ओळ अशी होती’, ‘उषा, ते जरा गाऊन दाखव बरं…’ मी फक्त आणि फक्त श्रवणभक्ती करीत होतो. हे सगळं सलग काही तास सुरू होतं. त्या गप्पा आणि चर्चा रेकॉर्ड करता आल्या असत्या, तर ती चिरंतन स्मृती राहिली असती. मला आजही ती हुरहूर लागून राहिली आहे. ‘आपण किती भाग्यवान आहोत’ असं वाटणारे जे मोजके क्षण आयुष्यात येतात, त्यातला हा एक क्षण होता. दीदी आज आपल्यात नाहीत. सुदैवानं आशाताई आहेत आणि त्यांच्या वयाची नव्वदी साजरी होताना आपण पाहत आहोत. एका अभिजात, श्रेष्ठ आवाजाची नऊ दशकं! आपल्याला अवर्णनीय आणि कालातीत असा आनंद देणारी नऊ दशकं!
मी त्या विशिष्ट काळाचा जेव्हा जेव्हा विचार करतो, तेव्हा मला आशाताई शम्मी कपूरसारख्या वाटतात. शम्मी कपूरसमोर राज कपूर होते, देव आनंद होते, दिलीपकुमार होते. या सगळ्यांनी चित्रपटसृष्टीचा अवकाश व्यापला होता. त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेतून मार्ग काढत, शम्मी कपूर यांनी मोठं यश मिळवलं. स्वतःची वेगळी शैली प्रस्थापित केली. नृत्याची वेगळी स्टाइल लोकप्रिय केली. सोलो फिल्म हिट करून दाखवल्या. हे तीन दिग्गज समोर असताना इतकं सगळं करून दाखवणं महाकठीण होतं. आशाताईंच्या बाबतीतही आपल्याला तेच म्हणता येईल. साक्षात दीदी समोर असताना, गीता दत्तसारखी व्हर्सटाइल गायिका ऐन भरात असताना, आधीच लोकप्रिय झालेल्या शमशाद बेगम, सुरैया या गायिका असताना, स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणं, ही खरं तर अशक्यप्राय भासणारी गोष्ट होती; पण आशाताईंनी ती करून दाखवली. आजबाजूला चौफेर प्रतिभांचा सुकाळ असतानाही, शम्मी कपूर यांनी आपल्या नावाचा स्वतंत्र ब्रँड तयार केला; तशीच किमया आशाताईंनीही करून दाखवली.
उत्तुंग काम केलेले काय एकेक कलावंत होऊन गेले आहेत! आजच्या क्षणाचा विचार केला, तर ज्या व्यक्ती हयात आहेत, त्यात केवळ आशाताई या एकच अशा आहेत, की ज्यांना ‘भारतरत्न’ मिळायला हवं. भारताच्या सांगीतिक क्षेत्राकडं पाहिलं, तर माझ्या मते, संगीताच्या क्षेत्रातली आपली जी श्रेष्ठ आणि संपन्न परंपरा आहे, त्यातील आशाताई ‘लास्ट एम्परर’ आहेत. अखेरच्या सम्राज्ञी आहेत. एकाच घरात दोन दोन ‘भारतरत्न’ कसे देता येतील वगैरे सारखे प्रश्न विचारणं हा निव्वळ मूर्खपणा आहे. एका घरात दोन महान व्यक्ती जन्माला आल्या आहेत, त्याला काय करणार? ही जर भारताची रत्नं नसतील, तर मग कोण आहेत? ‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत’ असं आपण तोंडानं म्हणतो; परंतु ‘भारतरत्न’ देण्याची वेळ आली, की प्रत्येक जण आपापल्या प्रांतातली नावं पुढं करतो. ‘भारत माझा देश आहे’ हे साफ विसरून जातो.
आशाताईंना दुय्यम गाणी मिळाली, असं अनेकांना वाटतं. मला काही ते फार पटत नाही. दुसरं म्हणजे, त्या काळात फक्त ओ. पी. नैयर यांनीच आशाताईंना नायिकेची आणि महत्त्वाची गाणी दिली, या म्हणण्यातही तथ्य नाही. ओपीनं गाणी दिली हे खरं आहेच, त्याबद्दल वादच नाही. ‘आँखो से जो उतरी है दिल में’, ‘आओ हुजूर तुम को’, ‘ये है रेशमी जुल्फों का अंधेरा’, ‘आईये मेहरबाँ’ अशी पन्नास-शंभर गाणी मी लागोपाठ सांगू शकेन. या दोघांच्या गाण्यातलं कुठलं अधिक चांगलं, ते कसं ठरवणार आपण? एकाच ताटात आमरसाची वाटी असेल आणि श्रीखंड असेल, तर त्यातलं कुठलं अधिक चांगलं, ते कसं सांगणार? प्रत्येकाची स्वतःची चव आहे आणि ती तेवढीच श्रेष्ठ आहे; तसंच या गाण्यांचं आहे.
त्या काळातली आशाताईंनी म्हटलेली एस. डी. बर्मन यांची गाणी बघा. मी काही उदाहरणं सांगतो. ‘सुजाता’मधलं ‘काली घटा छाए मोरा जियरा तरसाए’, ‘काला बाजार’मधलं ‘सच हुए सपने तेरे’, ‘बंबई का बाबू’मधलं ‘दिवाना मस्ताना हुवा दिल…’ कसली अफाट गाणी आहेत ही! दीदी आणि एस. डी. बर्मन यांच्यात त्या काळात काही कारणानं वाद झाला होता, म्हणून आशाताईंना ही गाणी मिळाली, असं म्हणणंही साफ चुकीचं आहे. त्या वादामुळं कदाचित चार गाणी जास्त मिळाली असतीलही; परंतु दीदींशी संबंध उत्तम असतानाही एस.डी.नं अत्यंत वेगळी आणि महत्त्वाची अनेक गाणी आशाताईंना दिली आहेत. नायिकांची गाणी आशाताईंना मिळाली नाहीत, असं उगाचच कुणी तरी हवेत पसरवलेलं आहे. हजारो गाणी आहेत आशाताईंनी नायिकांसाठी गायलेली. ‘बंदिनी’ या चित्रपटाच्या वेळेस लतादीदी आणि बर्मनदा यांच्यातला वाद मिटला. त्या चित्रपटातही दीदींना दोन गाणी आहेत आणि आशाताईंनाही दोन गाणी आहेत. मला वाटतं गुलजार साहेबांचं कारकीर्दीतलं पहिलं गाणं ‘मोरा गोरा अंग लईले…’ याच चित्रपटातलं आहे आणि ते दीदींचं आहे. याच चित्रपटातली ‘अब के बरस भेज भैया को बाबूल’ आणि ‘ओ पंछी प्यारे’सारखी दोन अतिशय मोहक, मधाळ गाणी आशाताईंनी गायली आहेत. या गाण्यांना दुय्यम म्हणायची हिंमत कोणी करील का?
– क्रमशः भाग पहिला
लेखक : श्री राज ठाकरे
प्रस्तुती – श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
किचनमध्ये शिरताना ,सवयीने रेडिओ सुरू केला.विविध भारतीवर बाईस स्कोपकी बाते मध्ये ” तिसरी कसम “ची कहाणी लागली होती. लगेचंच राजकपूर, वहिदा,पान खाए सैया हमारे …. सारं सरसर डोळ्यांपुढं आलं… .. नाजूक, नखरेल,डौलदार, तेवढीच खानदानी, शालीन दिसणारी वहिदा… माझी आवडती…..
…एकीकडे कथा पुढे पुढे सरकत होती….संवाद, गीतं, कथा, तर एकीकडे मिक्सरचा आवाज,,फोडणी,..फोन .. येणारे, जाणारे, अशा दोन्ही रुळांवर समतोल साधत मी गुंगून गेले.
या रेडिओमूळे, असे सहज जगण्याचे क्षण सुंदर होऊन जातात. तो माझा ” सखा सोबतीच” आहे….. मला हवी तेव्हा सोबत करणारा.
मी किचनमध्ये काम करतेय, अन् तो गप्प आहे, असं सहसा होत नाही. आणि जर असं झालंच तर तो बिघडलेला असेल, किंवा मी तरी. दुसरी शक्यता जास्त !!! कधीही कोणत्याही वेळेला सदासर्वकाळ, बिनशर्त सेवा द्यायला तो एका बटणावर तयार असतो.
तशीही मी मनातल्या मनात एकटी बडबडतच असते. ऐकायलाही मीच. पण हा माझा सखा, माझ्यासाठी बोलतो खूप कांही… अगदी ‘ चिंतन ‘ पासून दिनविशेष, बातम्या, दिलखुलास सारखे ज्ञानवर्धक आणि रंजक कार्यक्रम, सखी सहेली,अजून खूप काही, ऐकवतो सतत . रोजच ! कधी कधी छळतो, कंटाळवाणे, प्रायोजित ऐकवून. मग जरा कान पिळायचा. इकडे तिकडे बघायचं अन्नू कपूरचा कार्यक्रम अचानक ऐकू शकते.
सर्वात महत्वाचं तो काय ऐकवतो, तर सुमधुर गीतं. अगदी बरसातच असते. फक्त बटण दाबायचं अन् कानांनी सुश्राव्य आनंद टिपायचा … .बस दिन बन जाता है ! मूड बन जाता है ! एखादं आवडीचं जुनं गाणं लागलं की.
लहानपणी रात्री रेडिओवर श्रुतिका लागायच्या. आम्ही बहिणी कान देऊन ऐकायचो. कधी ऐकता ऐकता झोप लागून जायची. मग दुसऱ्या दिवशी पुढे काय झालं, ते विचारायचं… फार मज्जा असायची. साऱ्यांचे जग एकच असायचे घरात तरी. ही रेडिओची खासियत. आता स्मार्ट फोन आल्यापासून घरातल्या प्रत्येकाचं विश्व वेगळ झालंय.
एखादी मैत्रीण येते,काही बाही ऐकवून उदासी देऊन जाते, तर कोणी उत्साहाचं गुलाबपाणी शिंपून आपली उदासी पळवते. तर कोणी कर्तृत्वाची कहाणी ऐकवून प्रेरणा देते. तसेच रेडिओमुळे माझ्या मनात वेगवेगळ्या मुड्सची फुलं उमलत राहतात.
रेडिओ हे एक यंत्र असलं तरी त्याचा शोध लावणाऱ्यापासून आकाशवाणीचे सारे कलाकार, कामगार, तंत्रज्ञ, इतरही असंख्य लोकांचं योगदान आहे. त्यांच्या कृपेने, सेहगल, बालगंधर्व, भीमसेनजी, कुमारजी ….. अशा अनेक अनेक मान्यवरांची गीतं आपण घरात राहून एक बटणावर ऐकू शकतो , हे केवढं अप्रुप आहे.
त्यासाठी त्यांचे सर्वांचे ऋणी रहायला हवं.
2001 साली घेतलेला आमचा फिलिप्सचा हा रेडिओ, टेपरेकॉर्डर (2 इन वन) 20 वर्ष सेवा देतोय.
आता टेप बंद पडलाय. काटाही जागचा हलत नाही. अंदाजाने फेरे मोजून स्टेशन बदलता येतं.
Tv, इंटरनेट, असे रेडिओपेक्षा खूप प्रगत शोध लागले तरी रेडिओ, तो रेडिओच — जिवाभावाचा सखा सोबती — त्याची सर कशालाच नाही !
पाच वाजून गेले. कार्यशाळा संपण्याची काही लक्षणं नव्हती. नंदिताचं सारखं घड्याळाकडं लक्ष जात होतं. सकाळचा खडखडीत रस्ता आठवून तिच्या पोटात गोळा येत होता. आता त्याच रस्त्यानं जायचं आहे परत. निदान अंधाराच्या आत पोहोचलं तर बरं. पण छे! समारोप, चहापान हे सगळं होऊन कार्यशाळा संपायला सात वाजले.
नंदिता धावतच बसस्टँडकडे निघाली. पळव्यासारखं छोटंसं गाव. इनमिन दोन-अडीचशे वस्तीचं. एव्हाना सगळीकडे सामसूम झाली होती. त्यात वीज कपातीचे दिवस. डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही असा मिट्ट काळोख होता. सुदैवाने मोबाईलच्या टॉर्चमध्ये ती कशीबशी बसस्टँडवर पोहोचली. नशीब! तिथे मिणमिणता का होईना दिवा होता. मोजून सहा माणसं होती. नाही म्हणायला सातवा एक जण चहा उकळत होता. दूर कुठंतरी कुत्री केकाटत होती. त्यामुळे आणखीनच भीतीदायक वाटत होतं. सहा माणसात एक म्हातारी होती. धावतच नंदिता पटकन् तिच्याजवळ जाऊन उभी राहिली. धापा टाकतच नंदिताने विचारलं, ‘‘केव्हा येईल हो गाडी?’’
नंदिताला आपादमस्तक न्याहाळत म्हातारी म्हणाली, ‘‘ईल आता. तिचा काय नेम सांगावा?’’ म्हातारीच्या या बिनधास्त बोलण्यानं नंदिता जरा रिलॅक्स झाली. तिच्या बोळकं असलेल्या तोंडामुळं म्हातारी फार प्रेमळ वाटत होती. नंदितानं मोबाईल काढला. सकाळपासून देवेनला फोन करायलाच जमलं नव्हतं. तो काळजी करत असेल. बराच वेळ टुंग, टुंग वाजत राहिलं आणि नंतर ‘द नंबर यु आर ट्राईंग, इज करंटली नॉट रिचेबल, प्लीज ट्राय लेटर’. नंदिता वैतागली. पाच-पाच मिनिटाला फोन करत राहिली तरी प्रत्येक वेळेस तेच उत्तर! छे!
आज नेमके तिच्याबरोबर असणारी तिची मदतनीस आणि शिपाई दोघांनी ऐनवेळी दांडी मारली. देवेन म्हणत होता गाडी, ड्रायव्हर घेऊन जा, पण नंदिताची तत्त्व आड आली.
‘‘नको रे, किती गरीब माणसं असतात. त्यांच्यासमोर गाडी वगैरे घेऊन जाणं म्हणजे…!’’
‘‘ठीक आहे. पण लवकर निघ आणि अंधाराच्या आत घरी ये म्हणजे झालं.’’
हंऽ! आत्ता तिला पश्चात्ताप होत होता. एवढ्यात खडखड करत लाल डब्बा आला. सारे बसमध्ये बसले. नंदिता म्हातारीच्या जवळच बसली. हुश्श! तिनं सुस्कारा सोडला. शेवटी एकदाची बस मिळाली. आता नेईल अकरा-साडेअकरापर्यंत. नंदिता थोडीशी रिलॅक्स झाली. दिवसभराचा थकवा न् गार वार्याची झुळूक! त्यामुळे नंदिताला डोळा लागला. किती वेळ गेला कुणास ठाऊक. अचानक बसच्या गचक्यांनी तिला जाग आली. तिनं चटकन् म्हातारीच्या मांडीवर हात ठेवला. म्हातारी म्हणाली, ‘‘घाबरलीय व्हय? रोजचंच हाय. काय न्हाय. काळजी करू नगंस!’’ नंदिताला जरा दिलासा वाटला. ती बाहेर बघू लागली. बसच्या दिव्यांशिवाय सर्वत्र दाट अंधार होता. खड्ड्यांमुळे बसला धक्के बसत होते. तसा दिव्यांचा प्रकाशही खालीवर होत होता आणि तिचा जीवही. तिनं परत देवेनला फोन लावला. पुन्हा – तेच! ‘नॉट रिचेबल.’
जरासा चढ लागला अन् बस घरघरत चालू लागली. पाचेक मिनिटं ती कशीबशी चालू होती. नंदितानं घड्याळात पाहिलं. अकरा वाजून पाच मिनिटं झाली होती. बस नीट चालली, तर जेमतेम अर्ध्या तासात बस पोहोचली असती. पण छे! धाड-धाड आदळून बस जागेवर उभी राहिली. भीती अन् चिंतेनं नंदिता गोठल्यासारखी झाली. म्हातारीच्या मांडीवरचा हात तिनं घट्ट धरून ठेवला. म्हातारीनं पण तिच्या हातावर थोपटलं. तेवढ्यात उद्दाम आवाजात कंडक्टर म्हणाला, ‘‘उतरून घ्या. धक्का माराय लागंल. समदे उतरा.’’ धक्का मारला तरी ती बस टस् की मस् हलेना.
मिट्ट काळोख! रस्त्यावर वाहतूक नाही. बस सुरू होण्याची शाश्वती नाही. रात्री साडेअकरा, बाराच्या दरम्यान नंदिता एका पारावर बसली होती. बसमधले सहाजण इकडे-तिकडे फिरत होते. म्हातारी तिच्या शेजारीच, हाताची उशी करून लवंडली होती. तिला लगेच डोळाही लागला असावा. क्षणभर नंदिताला तिचा हेवा वाटला.
दोन तरुण तिथं आसपास फिरत होते. एकजण विड्या फुंकत झाडाला टेकून बसला होता. ड्रायव्हर-कंडक्टरचा आसपास पत्ताही नव्हता. कितीही अवसान आणलं तरी नंदिताच्या काळजाचा ठाव सुटलेला होता. देवेनची आठवण येऊन घशात आवंढा येत होता. फोनला अजिबात रेंज नव्हती. फोनची डबी हातात घेऊन नंदिता हताशपणे बसून होती. एका क्षणी, ती डबीही फेकून द्यावीसं वाटलं. एवढ्यात, तो समोर दिसला. थोडंसं दूरवर एका झाडाला टेकून बसलेला. चक्क लॅपटॉपवर काम करत होता.
म्हणजे… म्हणजे… नक्की त्याला रेंज असणार! या जगाशी कनेक्टेड असा ‘तोच’ होता. त्याच्याकडून काहीतरी आशा होती. त्याच्या फोनला रेंज असली तर? देवेनला कळवता तरी येईल. पण तो… तो तर बघायलाही तयार नव्हता. कोण असेल तो? कामात व्यग्र आहे की मुद्दाम करतोय? भला माणूस असेल का? नंदिता स्वतःशीच बोलत होती. ‘बोलावं का त्याच्याशी?’ अशा विचारानं नंदिता उठली. दोनच पावलं टाकली अन् तशीच माघारी फिरली. नको! नकोच! कोण, कुठला तिर्हाईत माणूस अशा जागी, अशा वेळी त्याच्याशी बोलायला नको नकोच!
जगाशी संपर्क साधायला एकही साधन नाही. एकमेव तोच आशेचा धागा आहे. पण त्याला जराही स्त्रीदाक्षिण्य नाही? राग, संताप, भीती, चिंता, अगतिकता, असहाय्यता, उद्विग्नता अशा सर्व टोकाच्या भावनांमुळे नंदिताला बधिरपणा आला. मोठा सुस्कारा सोडून आकाशात पहात राहिली. नशिबानं आकाश निरभ्र होतं. चांदणं पसरलं होतं. तेवढ्यानंही नंदिताचं मन हलकं झालं.
अचानक मागच्या बाजूला, तिला एक उग्र दर्प जाणवला. काहीतरी चाहूल लागली. तिनं चमकून पाहिलं तर एकजण तिच्याजवळच बसलेला दिसला. ती अंगभर शहारली. संतापून त्याच्याकडं पाहिलं. राग, चीड, घृणा त्यातून व्यक्त केली. तर तो उलट म्हणाला, ‘‘काय नखरा? लई शाणी गं!’’ बळं-बळं आणलेलं तिचं अवसानच गळालं. नंदिता चटकन उठली न म्हातारीच्या पलिकडं जाऊन बसली. तिनं थरथरता हात म्हातारीच्या अंगावर ठेवला. म्हातारीचाच काय तो एकमेव आधार होता.
दूरवर दिवे दिसत होते. जवळ-जवळ आले अन् तसेच दूर गेले. ट्रक होता तो एक. हंऽ! सुस्कारा सोडून तिनं पुन्हा एकदा फोन लावण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, पण पुन्हा ‘‘द.नं.यू.आर. ट्राईंग इज करंटली नॉट रिचेबल’’ हंऽ! पुन्हा-पुन्हा तेच उत्तर त्याच आवाजात देणार्या त्या बाईचाही तिला राग आला. काय करावं? विचारावं का लॅपटॉपवाल्याला? तेवढ्यात दूरवर पुन्हा वाहनाचा प्रकाश दिसू लागला. बस आली की काय? पण छे! ही तर कार आहे. जाईल निघून आली तशी म्हणून ती तशीच निराश, हताश बसून राहिली.
आश्चर्य म्हणजे, ती कार त्यांच्याजवळच येऊन थांबली. कार आलिशान होती. त्यामधून ड्रायव्हर खाली उतरला अन् लॅपटॉपवाल्याजवळ गेला. त्याची लॅपटॉपची बॅग घेऊन कारच्या मागच्या सीटवर ठेवून दरवाजा उघडून उभा राहिला. तो लॅपटॉपवाला मागे न बसता पुढच्या सीटवर बसला. ड्रायव्हरशी काहीतरी बोलला. ड्रायव्हरने दरवाजा बंद केला अन् तिच्यासमोर येऊन उभा राहिला. नंदिता पहातच राहिली.
‘‘काऽऽय?’’ ती ओरडलीच. कोण साहेब? अन् मला का सांगितलं, एवढा वेळ तर शब्दानं चौकशी नाही अन् आता एकदम गाडीत बसा?
तिला कळेचना. ड्रायव्हर परत म्हणाला, ‘‘हो मॅडम चला. रात्रीची वेळ आहे. इथं आडरानात किती वेळ बसणार?’’
ते तर खरंच होतं. पण हा कोण, कुठला? त्याच्यावर कसा विश्वास ठेवणार? क्षणभर ती विचारात पडली. पुन्हा विचार केला. याच्याबरोबर गेलं तर काही तरी परिस्थिती बदलेल. नाहीतर इथे किती वेळ बसून रहाणार? ‘इकडे आड तिकडे विहीर’ तिने विहिरीत उडी घ्यायची ठरवलं. ती उठली. ड्रायव्हरने तिच्या हातातली पिशवी घेतली, म्हणाला, ‘‘चला मॅडम, आधीच खूप उशीर झाला आहे.’’ ड्रायव्हरचं बोलणं सज्जन, सभ्यपणाचं वाटत होतं. ती नाईलाजानं यंत्रवत त्याच्या मागोमाग जाऊन गाडीत बसली. ‘‘आपण कोण?’’ असं बोलण्यासाठी तिनं तोंड उघडलं, पण तिचा आवाजच फुटला नाही. पाणी प्यावं म्हणून पर्समध्ये पाण्याची बाटली पाहिली तर ती नव्हतीच.
सर्व भरवसा देवावर सोडून अतीव मानसिक त्रासाने ती डोकं मागं ठेवून डोळे मिटून बसून राहिली. तिचे पाय लटपटत होते. धडधडणारं काळीज बाहेर येईल असं वाटत होतं. आपण सुरक्षित आहोत की आणखीन धोक्यात चाललोय तिला कळेना. पण आता विचार करण्याचेही त्राण तिच्यात नव्हते. जेमतेम दहा-बारा मिनिटातच गाडी थांबली. आता काय? म्हणून तिनं घाबरून डोळे उघडले तर गाडी चक्क तिच्या घरासमोर उभी होती. तिचा विश्वासच बसेना. देवेन फाटकातच उभा होता. ड्रायव्हरने दार उघडताच, ती धावत जाऊन देवेनला बिलगली. देवेनने तिला थोपटलं अन् पुढे झाला.
तोही गाडीतून उतरला. म्हणाला, ‘‘सांभाळ तुझी अमानत.’’ देवेननं त्याता हात हातात घेत म्हटलं, ‘‘थँक्स यार निनाद. तुझ्या रूपानं देवच भेटला. आत ये ना कॉफी घेऊ.’’
‘‘अरे नाही. परत कधीतरी. आता फार उशीर झालाय.’’ असं म्हणून तो गाडीत बसून क्षणात दिसेनासा झाला.
नंदिता पहातच राहिली. कोण निनाद? त्याचा देवेनशी काय संबंध? आणि त्यानं मला अलगद घरी कसं आणलं?
देवेननं तिला जवळ घेतलं अन् हसत तिच्याकडे बघत राहिला.
‘‘अरे हसतोस काय? सगळा काय प्रकार आहे!’’ म्हणून तिनं विचारलं.
तेव्हा देवेननं तिला सांगितलं- ‘‘अगं आम्ही मागच्या वर्षी बंगलोरला एकत्र होतो.’’
हे सगळं व्हॉटस्अॅप प्रोफाईलच्या दोघांच्या फोटोमुळं झालं. त्यावरून त्यानं तुला ओळखलं अन् मला विचारलं, ‘‘अरे मी इथं आडरानात अकडलोय. माझ्यासमोर एक स्त्री आहे. ती तुझ्या बायकोसारखी वाटते. ती जर तीच असेल, तर मी कार बोलावली आहे, तिला घेऊन येतो.’’
त्यावर मी तुझा एक फोटो त्याला पाठवला. कन्फर्मेशन झालं. पत्ता पाठवला अन् तू अशी अलगद घरी आलीस! सो सिंपल!
सो सिंपल? अरे फार भयंकर होतं सगळं, पण खरंच अशी माणसं जर असतील, ना तर समस्येलाच म्हणावं लागेल, ‘‘नॉट रिचेबल!’’
नारळी पौर्णिमा झाली आणि सागर थोडासा शांत झाला, त्यामुळे सागरावर जाणाऱ्या मच्छीमारांना आता आपल्या नौका समुद्रात नेता येतील! नारळी पौर्णिमेला समुद्रामध्ये नारळ अर्पण करून सागराची प्रार्थना केली जाते. तो सागर आता आपल्याला नेहमीच चांगली साथ देणारा आहे असा काहीसा विचार मनात आला आणि सागराची विविध रूपे डोळ्यासमोर आली.
असीम, अथांग सागरा, आत्तापर्यंत तू वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या रूपात भेटलास! बालपणी अरबी समुद्राच्या किनारपट्टीवरच बालपण गेलं!
काळी वाळू असलेल्या समुद्रावर वाळू तुडवत जाताना सूर्याचा गोळा अस्ताला जाईपर्यंत दूरवर दिसणाऱ्या बोटीसह तू चित्रात दिसावा तसं मी तुला पाहत होते! तेव्हा तुझी असीमता मला कळत नव्हती, ती माझ्या मनासारखीच छोटीशी होती.
समुद्रकिनाऱ्यावर फिरणे, भेळ खाणे आणि तो सूर्याचा लाल गोळा तुझ्या पोटात सामावला की घरी परत यायला निघणे. तुझा अस्त ही आमची घरी परतायची सीमा होती. तो रत्नागिरीचा काळा आणि डोंगरापलीकडचा पांढरा समुद्र बघत मी मोठी झाले!
खूप वर्षांनी मुंबईला जाण्याचा योग आला आणि तुझे चमचमणारा हार घातलेले मरीन ड्राईव्ह वरील रूप डोळ्यांना मोहवून गेले, तर गेटवे ऑफ इंडिया ला जाऊन तुझे खळाळणारे रूप पण पहायला मिळाले. जुहूच्या बीचवर तरुणांचा उसळता समुद्र दिसला तर कधी पाश्चात्यांच्या अनुकरणात दंग झालेल्या आधुनिक रूपात तू दिसलास!
जसा देश, तसा वेश असा बदलता तू मला नेहमीच भुरळ घालत राहिलास! गोव्यातील समुद्र पाहताना बा.भ.बोरकरांच्या “माझ्या गोव्याच्या भूमीत” कवितेतून दिसणारा तू डोळ्यासमोर येत होतास! किनाऱ्यावरील माडांच्या झावळ्यांचे आच्छादन घेऊन शितलता देणारं तुझं रूप थोडं सौम्य वाटत होतं!
पुढे गुजरात ट्रीप करतानाही तू सांगाती होतास. ओख्याच्या स्वच्छ किनाऱ्यावर शंख शिंपले वेचताना तुझ्या लाटांची गाज माझ्या कानात घुमत होती. द्वारकेला कृष्णाला मनात साठवताना हेच ते ठिकाण जिथे रुक्मिणीसह राजवाड्यात राहताना द्वारका बेटाभोवती संरक्षण देणारा तू होतास!
प्रत्येक ठिकाणी तुझं रूप न्याहाळताना माझी मीच राहत नाही! इतका तू विशाल होऊन मी तुझ्यात सामावून जाते….
आंध्र – ओरिसाची सहल करताना तुला पाहिले ते शांत रूपात! भुवनेश्वरला तुझं एक रूप पाहिलं तर कलकत्त्याला गंगेच्या विस्तीर्ण मुखाला सामावून घेणारा तू होतास!
तुझं खरं रूप पाहायचं ना ते कन्याकुमारीला! बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरबी समुद्र तिन्ही तुझीच रूपे, लहान- मोठी! तिन्ही सागर एकत्र पाहिले की तुझी विशालता मनात भरून राहते! कन्याकुमारीला सकाळचं समुद्र दर्शन करताना दूरवर दिसणारा विवेकानंद रॉक! इतक्या गंभीर वातावरणात स्वामीजींनी चिंतन केलं असेल ही कल्पनाच अंगावर काटा उभा करणारी होती! तो ज्ञानरूपी सागर खऱ्या सागरास अर्घ्य देऊन त्या खडकावर बसला असेल तेव्हा हे तीनही सागर त्याच्या चरणस्पर्शाने अधिकच पुनीत झाले असतील! एक संध्याकाळ कन्याकुमारीत अनुभवली! जिथे बंगालच्या उपसागराचे करड्या रंगाचे, अरबी समुद्राचे निळ्या रंगाचे आणि हिंदी महासागराचे अथांग पाणी, तिन्ही समुद्राचे पाणी एकमेकात मिसळताना पाहताना अंतरंगात इतके भाव उचंबळून आले की त्यांचे वर्णन करता नाही येत!
तुझे रुपच असे विशाल आहे. तुझ्या लांबी, रुंदी, खोलीचे मोजमाप शास्त्राप्रमाणे होत असेल कदाचित, पण खरं सांगू? तुझी अथांगता फक्त दृष्टीला जाणवते, मन जसं अपार, गूढ, अनाकलनीय आहे, तसाच तू अथांग आहेस! तुझ्या पोटात काय काय दडलं असेल!
वीर सावरकरांनी फ्रान्सच्या किनाऱ्यावर ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ म्हणताना, ते ऐकून तू सुद्धा गहिवरला असशील त्यांच्या देशभक्तीने! नाही तर एरवी कोणताही किनारा तुला सारखाच असेल ना भरती ओहोटीच्या लाटांनी वेढलेला! पण सावरकरांना आपल्या भारताच्या किनारपट्टीवरचा तू दृष्टीसमोर होतास!स्वातंत्र्य या भूमीला मिळालेले पाहायचे होते त्यांना! त्यासाठी तर त्यांनी अंदमानचा कारावास भोगला! तिन्ही बाजूंनी तू या भरतभूला वेढलं आहेस!
सह्याद्रीच्या कड्यांपली कडे अरबी समुद्राची तुझी दंतुर किनारपट्टी कोकणचं सौंदर्य वाढवते, तर पूर्वेला गंगा नदीच्या मुखाजवळचे बंगालच्या उपसागराचे बंगाली गाणे ऐकते. केरळच्या देवभूमीवर सागरा, तुझे सारे सौंदर्य फुलून आलेले असते. खरंच, या भरत भूचा एकेक भाग पाहताना मनात असंख्य विचार येतात..
भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक विविधतांनी नटलेल्या आपल्या भरतखंडाला नगाधिराज हिमालयाचा मुकुट आहे तर तिन्ही सागरांनी वेढलेला रत्नजडीत हार त्याच्या गळ्यात आहे. वेगवेगळ्या संमिश्र भावना तुझ्या दर्शनाने मनात येतात. त्या शब्दरूपात नाही मांडू शकत, पण भक्तीभावाने तुझ्या या निसर्गाच्या रूपा पुढे मी कायमच नतमस्तक होते आणि कृतज्ञतापूर्वक मी हा नारळ तुला अर्पण करून हा नारळी पौर्णिमेचा दिवस साजरा करीत असते!
मंगळागौर व्रत हे आईने मुलीला दिलेले व्रत आहे. शंकर पार्वती हे आदर्श जोडपे .त्यांचा आदर्श आपल्या मुलीने समोर ठेवून चांगला संसार करावा यासाठी हे व्रत असते. हे व्रत सलग पाच वर्षे करायचे असते. मी चार पिढ्यांच्या मंगळागौरी पाहिल्या. पूर्वी मुली लहान असत. घरातील मोठी माणसे सांगतील त्याप्रमाणे वागत .हे व्रत या माध्यमातून भक्ती भावाने केले जायचे. डामडौल अजिबात नव्हता. खेडेगावात वाहनांची सोय नव्हती. पाऊस भरपूर असायचा. त्यामुळे पै पाहुणे फारसे कुणी या व्रताला जात नसत. घरच्या पुरतीच ही पूजा असायची. सजावट वगैरे फारशी नसायची. जेवायला मात्र साग्र संगीत नैवेद्य असायचा. मुली अगदी “न्हाऊनी माखुनी”, नऊवारी चा बोंगा सावरत, भरपूर दागिने अंगावर घालून व्रताला बसत. जिरे साखर तोंडात घेऊन पूजा भक्तिभावाने करत. दुपारचे जेवण मुक्याने करत असत. संध्याकाळी गावातील सर्व सुवासिनींना हळदी कुंकवाला बोलावले जायचे. दारात मोठी रांगोळी असायची. साखर खोबऱ्याची खिरापत आणि गव्हाने ओटी भरली जायची. संध्याकाळी वशेळ्या मुलींना भाजके पदार्थ खाऊ घालत. बहुतेक सगळ्यांना मग कढी, खिचडी, लाडू ,करंज्या, चकली ,मटकीची उसळ, असे पदार्थ जेवायला असत. रात्री मनसोक्त खेळ खेळत. त्यातून मग मनमोकळा संवाद होत असे. दुसरे दिवशी पहाटे उठून मुली आरती करत. दही भाताचा नैवेद्य दाखवत. व फुले, पत्री यांचे विसर्जन करून व्रताची सांगता करत असत. हे व्रत सलग पाच वर्षे करत. मग पाचव्या वर्षी आईला वाण देऊन या व्रताचे उद्यापन करत असत.
आता सगळे बदलले. मुली मोठ्या असतात. बहुतेक नोकरीवाल्या असतात. त्यांना वेळ नसतो. मग त्या पहिल्या वर्षी पहिल्याच मंगळवारी व्रताचे उद्यापन करून टाकतात. थाटमाट भरपूर असतो. फुले, पत्री यांची भरपूर सजावट असते .बहुतेक ठिकाणी महादेवाची पिंड करतात. पण माझ्या मंगळागौरीच्या वेळी माझ्या आईने पिंड करण्यास नकार दिला. एक तर गंज काळा करण्यास तिचा विरोध होता. शिवाय तो उपडा घालून ती मंगळागौर झाकली जाते असे तिचे म्हणणे असायचे. आता लाईटच्या माळा, फुले, विविध प्रकारचे डेकोरेशन, सजावट भरपूर .फोटो, व्हिडिओ शूटिंग ,नातेवाईकांची गर्दी, मित्र-मैत्रिणींचा धांबडधिंगा असतो .रात्री जागरण फार करत नाहीत. संस्कार भारतीने मंगळागौरीच्या खेळांच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. आता खूप जणी तयार झाल्यात. मग अक्षरशः दहा दहा हजार रुपये देऊन त्या मुलींना बोलावतात. माझा देखील सातारला खूप मोठा ग्रुप होता. एका दिवशी पाच सहा ठिकाणी आमंत्रणे असत. मग सोयीप्रमाणे कधी कधी सकाळी नऊ वाजता सुद्धा जाऊन तासभर खेळून यायचे. बाकीच्या बायका फक्त पहात बसतात. कोणी खेळत नाहीत. काही ठिकाणी तर मुलींना रजा नाही या नावावर संध्याकाळी ऑफिस मधून आल्यानंतर पूजा असते. ते सुद्धा हात पाय धुऊन त्या मुली बसतात. मेकअप भरपूर असतो. ज्वेलरी, कपडे, फोटो, व्हिडिओ शूटिंग हे मात्र अतीच असते. आता हा दिवस व्रत नव्हे तर इव्हेंट म्हणून साजरा केला जातो. देणे घेणे भरपूर असते. कालाय तस्मै नमः!. पण काही का असेना लग्नानंतर श्रावणातली एक तरी मंगळागौर साजरी केली जाते हे तरी अजून चालू आहे. पुढे काय होईल कोण जाणे. आता मुली लग्न होऊन परदेशी जातात. तिथे कुठली आली मंगळागौर आणि कुठले आले आहे व्रत! असो. मंगळागौरी श्रावणातल्या मंगळवारीच करायची असते हे देखील आता मागे पडत चालले आहे. मुलींना किंवा त्यांच्या आईला, सासूला रजा नसते. म्हणून मंगळवारी घरातल्या घरात पूजा करून रविवारी मोठा कार्यक्रम करतात. मुलींना खेळायला बोलावतात. सोयीप्रमाणे व्रताचे बदललेले रूप पाहून अवाक व्हायला होते. यातही आणखी गंमत म्हणजे माझ्या मैत्रिणीची मुलगी लग्न होऊन अमेरिकेला गेली. ती डिसेंबर मध्ये फक्त तीन आठवड्यांसाठी आली. आणि त्यावेळी त्यांनी वर्षातले सगळे सण साजरे केले. डिसेंबर मध्ये मंगळागौरीचा इव्हेंट केला. आता बोला !
लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मी… माझा बाप… आणि माझी आई… !!!… भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
(कोणताही निर्णय घेण्याचा समसमान अधिकार दोघांनाही आहे, कसलीच बळजबरी कुणी कुणावर करणार नाही’ या बोलीवर त्यांना बोलणं आणि भेटण्याची संधी दिली.) इथून पुढे.
एके दिवशी दोघांनी हसत हसत येऊन निर्णय दिला… “आम्ही दोघेही स्वखुशीनं लग्नाला तयार आहोत… !”
तरुण मुलीच्या लग्नाची काळजी असणाऱ्या वधुपित्याची काय गत होत असेल हे मी त्यावेळी प्रत्यक्ष अनुभवलं ! आयुष्याच्या या नाटकात यावेळी सगळ्याच भुमिका मलाच पार पाडाव्या लागल्या. हे नाटक मी खरोखर जगलो…! मीच पुरोहीत होवुन कधी लग्नाची तारीख काढली… तर मीच माझ्याशी बैठक घेवुन दोन्ही बाजुची यादीही केली ..! मुलाची बहिण होवुन मीच माझ्याशी भांडलो… तर मुलीची आई होवुन स्वतःशीच उगीच रडलो…!
या लग्नात मी वरातही झालो… आणि वरातीची म्हातारी घोडीही झालो…! मुंडावळ्या बनुन कधी कपाळावर झळकलो तर पायताण बनुन पायातही सरकलो… !
भर लग्नात मीच माझ्यावर रुसलो आणि मीच माझी समजुत काढुन पुन्हा खोटंखोटं हसलो … ! आणि त्याच्याबरोबर जातांना, ज्या क्षणी ‘दादा’ म्हणत मला तीनं गळामिठी मारली त्याक्षणी त्या मी तीचा बापच झालो… !
आज या लग्नाला दोन वर्षे झाली. दोघंही आनंदात आहेत, तीच्या अगोदर असलेल्या मुलासह !
या मुलाचं मला कौतुक वाटतं… आपल्या आईच्या लग्नाला तो हजर होता…! कळता झाल्यावर लोक त्याला टोचुन बोलतील का… ? सध्या माझ्याकडं या प्रश्नाचं उत्तर नाही!
असो !
जमिनीवर पडते ती सावली… ! हि सावली कुणाला आधार देते तेव्हाच ती छाया होते !!!
हे दोघेही एकमेकांना आधार देत, मुलाची छाया बनले आहेत. बीनबापाच्या मुलाला त्याने आपलं नाव दिलं आहे, खऱ्या अर्थानं तो बाप झाला आहे…!
बेसुर आणि भेसुर आयुष्य आता संगीत झालंय ! संगीत ऐकायला दरवेळी त्यातलं काही कळावंच लागतं असं नाही… मैफिल जमली की गायकाच्या हृदयात आधी तार झंकारते… ती ऐकु आली म्हणजे झालं… ! पहिली दाद या झंकाराला दिली… की कागदावरचे शब्द मोहरुन कविता होतात… ! या कवितेत गाणाऱ्याचा आणि ऐकणाऱ्याचा भाव एकरुप झाला की त्याचं भावगीत तयार होतं… ! या दोघांच्या या गाण्याला दाद देणारा मी फक्त रसिक !!!
आज हे सारं आठवायचं कारण म्हणजे…
‘ती’ अजुन एकदा आई होणार आहे हे मला ‘त्या’ने जानेवारी 2020 मध्ये सांगितलं. म्हणाला “सर, आत्ता चौथा महिना सुरु आहे तीला…”
“होय बाबा, आता सगळे कामधंदे सोडुन दुपटी शिवत बसतो मी …” माझ्या या बोलण्यावर ‘तो’ लाजला होता.
यानंतर दवाखान्यात नोंदणी, तपासण्या वगैरे आटोपुन 19 जून 2020 ला ती प्रसुत झाली. मुलगा झाला ! ‘त्या’ला आणि ‘ती’ला भेटायला आज 20 जुन ला मी पेढे घेवुन गेलो. दोघांच्या डोळ्यातला आनंद लपत नव्हता.
लाॕकडाउन मुळे याचा व्यवसाय ठप्प आहे, भल्याभल्यांची गाळण उडाली आहे, याचा कसा टिकाव लागणार ? पण हरकत नाही, ये भी सही ! चालतांना कधीतरी काटेही टोचलेलं बरं असतं, म्हणजे माणुस त्याच जागी रेंगाळत नाही… काटे बोचायला लागले की, ती जागा सोडण्यासाठी का होईना, पण चालणाराचा वेग वाढतो… !
तो, नको नको म्हणत असतांना, त्याच्या खिशात साडेचार हजार रुपये कोंबले.
तो म्हणाला, “सर, हाॕस्पिटलची बिलं, औषधांचा खर्च आणि बाकीचंही सगळं तुम्हीच करताय, वर अजुन हे पैसे कशाला… ?”
“पहिली डिलीव्हरी माहेरीच असते बाबा, पोरीच्या बापालाच करावं लागतंय सगळं…” मी खळखळुन हसत म्हणालो…
मी हसत होतो आणि मागं मला तीच्या हुंदक्यांचा आवाज जाणवत होता … !
ती नाहीच बोलली काही… पण तीचे डोळे बोलायचे थांबत नव्हते… !
मी बाळाकडे पाहिलं… इतकं देखणं बाळ… ! कमळ चिखलात उगवतं हेच खरं… !
“तुझ्यासारखंच आहे गं बाळ” मी म्हटलं.
पालथ्या मुठीनं डोळे पुसुन ती हसायला लागली… !
कोणत्याही रडणाऱ्या आईजवळ जावुन बाळाचं कौतुक करावं, ‘स्सेम तुझ्यावरच गेलंय बघ’ म्हणावं… ती हसणारच ! कारण वजन फुलांचं होत असतं, सुगंधाचं नाही…!
एखाद्या आईच्या ममतेचं वजन कसं करणार ? ते ही या न दिसणाऱ्या सुगंधासारखंच !
“बाळाचं नाव काय ठेवायचं ठरवलंय ?” निरोप घेत मी उठत सहजच विचारलं.
अगदी सहज आवाजात ती म्हणाली, “हो ठरवलंय ना ! अभिजीत नाव ठेवणार आहे आम्ही बाळाचं … !”
“क्काय … ?” खुप जोरात मी हे वाक्य ओरडुन बोललो असेन. कारण दवाखान्यातल्या अनेकांनी चमकुन पाहिलं माझ्याकडं !