मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शिव… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

? मनमंजुषेतून ?

☆ शिव… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

# जगाने ऐश्वर्य उपभोगावे म्हणून स्वतः स्मशानात राहतो तो शिव असतो…

# जगाला मांगल्याचे अमृत मिळावे म्हणून जो स्वतः हलाहल कंठी धारण करतो तो शिव असतो…

# पत्नीचे वाहन व्याघ्र, एका मुलाचे वाहन उंदीर, एकाचे मोर आणि स्वतःचे वाहन नंदी असताना, तसेच स्वतः कंठी व्याल {सर्प } धारण करतो ( अर्थात परस्पर विरोधी वाहनं/स्वभाव असताना… ) आणि तरीही गुण्या गोविंदाने स्मशानात आपला संसार थाटतो आणि आदर्श संसार करतो, तो शिव असतो…

# सर्व विद्यांचा निर्माता, सर्व कलांचा निर्माता, सर्व गुरूंचा गुरू असताना, सर्वांपासून अलिप्त राहून स्मशानात कायम ध्यानस्थ राहू शकतो, तो शिव असतो…

# आपल्याला असलेले सर्व ज्ञान जगाला प्राप्त व्हावे म्हणून सर्वप्रथम आपल्या पत्नीला देतो, तो शिव असतो…

# साऱ्या विश्वाचा पसारा सांभाळताना, त्यातूनच वेळ काढून आपल्या पत्नीशी निवांत गप्पा मारतो, तो शिव असतो…

( कोणत्याही कथेच्या आधी शिव पार्वती संवाद झाल्याचे आपल्याला आढळेल…! )*

# जो स्वतः शिव असताना, जगाचा आद्यगुरू असताना, अखंड रामनाम स्मरण करीत असतो, तो शिव असतो…

# जो देव दानव, मानव, भूतखेते सर्वांना पूज्य असतो, तो शिव असतो…!

# जो कधीही सत्याची कास सोडत नाही, त्यामुळे तो शिव होतो आणि जसा असतो तसा तो सुंदर दिसतो…

“सत्यम् शिवम् सुंदरम्”

भगवान शंकर महाराज की जय !!! सद्गुरू नाथ महाराज की जय!!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी, झुरळ आणि संवेदनक्षमता…! ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ मी, झुरळ आणि संवेदनक्षमता…! ☆ सुश्री शीला पतकी 

नातीने माझ्यापुढे वही धरली आणि मला म्हणाली, ” आजी तु शीला.. मग संवेदनाशीला कोण?” मी म्हणाले संवेदनाशीला अशी व्यक्ती नसते संवेदनाशीलता हा गुण आहे.. खरं तर ती क्षमता आहे म्हणून त्याला संवेदनक्षम असेही म्हणतात. म्हणजे पहा परवा दारात एक मरतूकडे कुत्रे कुडकुडत बसले होते… मग तू त्याला लगेच चादरीचा छोटा तुकडा टाकलास खायला दिलं कारण तू संवेदनाक्षम आहेस असं ज्याच्या मनात येतं ना दुसऱ्याबद्दल तो माणूस संवेदनाक्षम असतो… आता पाचवीतल्या मुलीला यापेक्षा वेगळं काय सांगणार… !

प्रत्येक माणूस संवेदनाक्षम असतोच हा गुणवर्धिष्ण होणं गरजेचं आहे… आपण लहान असताना संवेदनाक्षम असतोच पण जसे जसे मोठे होत जातो.. व्यवहारी बनत जातो.. जगाचा अनुभव घेत जातो तसे तसे ही संवेदना कमी होते. ही ज्याची टिकून राहिली त्याचे बालपण पण टिकते त्याला दुसऱ्याचं दुःखाशी समरस होता येते.

मला आठवतं लहानपणी म्हणजे सुमारे 60 /65 वर्षांपूर्वी आमच्या घरामध्ये झुरळं झाली होती त्यांना मारण्यासाठी कुणीतरी एक औषधाची डबी दिली. काड्यापेटी सारख्या तो बॉक्स होता आणि आत एक गुलाबी रंगाची पुडी होती. ते औषध पिठात मिसळून ठेवले की झुरळ खातात आणि मरतात. ते लहान मुलांपासून वेगळे ठेवावे असे त्या वेळेला आवर्जून सांगत अगदी नवीन औषध निघाले होते !आम्हा सगळ्या घरातल्या छोट्या मुलांना बोलवून.. याला हात लावायचा नाही.. हे निक्षून सांगितले आम्ही म्हणलं हे कशासाठी आहे? तर ते झुरळ मारण्यासाठी आहे विषय संपला!… मी चौथीत होते माझ्या डोक्यात विषय अधिक पक्का झाला झुरळ मारण्यासाठी औषध… खरंतर औषध बरं करण्यासाठी देतात मग हे मारण्यासाठी का वापरतात मग त्या झुरळाना किती वाईट वाटेल आणि समजा एक आई झुरळ आणि एक मूल झुरळ असेल किंवा एक मित्र झुरळ असेल तर त्यांना किती वाईट वाटेल कोणीतरी मेल तर आणि या माझ्या विचारातून मी दोन पानी संवाद लिहिला… दोन झुरळं एकमेकांशी बोलतात आणि माणसाने आपल्यासाठी मरावयाचे औषध तयार केले आहे त्यामुळे आपण आता नक्कीच मरणार ही माणसं किती वाईट आहेत ना…. असा विचार घेऊन मी मोठी फुलस्कॅप दोन पानं लिहिली होती अर्थात ती कुणाला दाखवली नाहीत त्यावेळेला ते लाज वाटत होती आणि खरंच आजपर्यंत मी कोणाशी बोलले पण नाही पण मला वाटतं ती माझ्या संवेदनाक्षम मनाची खूण होती आणि तिथूनच मी लिहायला सुरुवात केली असावी!

माणसं म्हातारपणी संवेदनाक्षम, हळवी होतात असं सर्वत्र म्हटलं जातं असं काही नसतं फक्त त्या त्या काळात आपण इतर भावनांना अधिक महत्त्व देतो. मग कधी कर्तव्याला कधी कठीण होण्याला कधी कठोर निर्णय घेण्याला आणि त्यामुळे ती संवेदनक्षमता थोडी बाजूला पडते याचा अर्थ माणूस संवेदन क्षमता हरवून बसलाय असं नसतं थोड्या अधिक प्रमाणात हे कमी होऊ लागले हे सत्य आहे आपण अगदी जेवण करीत टीव्हीवर दाखवली जाणारी प्रेत यात्रा पहात असतो हे कोणत्या संवेदनक्षमतेचे उदाहरण आहे? आपण थोडे बोथट झालो आहोत एवढे मात्र खरे!…….

प्रत्येक माणसाच्या अंगी संवेदनक्षमता असतेच त्याचे एक छान उदाहरण मी परवा एका कार्यक्रमात ऐकले रुळानुबंध नावाचे श्री कुलकर्णी यांचे पुस्तक आहे त्याबद्दल सांगताना त्यांनी असे सांगितले की ते रेल्वे इंजिन चालवत असत त्यांच्या त्या डब्यात म्हणजे इंजिनाच्या आत एक फुलपाखरू आले आणि ते डबाभर इकडे तिकडे हिंडू लागले ब्रेकच्या याच्यावर बस वरती टपावर बस असे ते इकडून तिकडून धावत होते त्याला पाहण्यात लेखकाला खूप आनंद मिळत होता इथं पावेतो गाडी पंधरा-वीस किलोमीटर पुढे आलेली होती आणि लेखकाच्या मनात विचार आला.. अरे बापरे हे फुलपाखरू आपल्या सवंगड्यांना मित्रांना भावंडाला सोडून आता इतकं पुढं आलंय…. हे आता परत त्यांना कधी भेटेल ना?.. इतक उडून जाणं त्याला शक्य होईल का? त्याला मार्ग सापडेल का?.. कितीतरी प्रश्न… असा विचार हजार माणसांना घेऊन जाणारी रेल्वे चालवणाऱ्या माणसाच्या मनात हे येते, तो संवेदनाक्षम नाही का?.. मला ते ऐकल्यानंतर खूप मजा वाटली किती छोटी घटना किती जबाबदारीचे काम पण ते करत असतानाही हा माणूस किती संवेदनाक्षम होता…!

अनेक संवेदनाक्षम माणसांमुळे फार मोठी सामाजिक कार्य उभी राहिली आहेत… बाबा आमटे यांनी रस्त्यावर वेदनाने जखमाने तळमळत पडलेला महारोगी पाहिला आणि त्यांच्या संवेदनक्षम मनाला त्या यातना कुठेतरी भिडल्या आणि त्यातूनच कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी मोठे कार्य उभे राहिले… माझी मानस कन्या अनु आणि प्रताप मोहिते यांच्या संवेदनाक्षमतेमधून अनाथ मुले आणि बेघर झालेले आजी आजोबा संभाळण्याचे एक मोठे काम सोलापूर जवळ चालू आहे तेथील एकूण संख्या 80 आहे हा मुलगा फक्त रिक्षा चालवतो पण अनेकानी मदतीचा हात पुढे केला. अनु स्वतः 80 माणसांचा स्वयंपाक रोज करते एक मोठं काम उभे राहिले आहे ते त्यांच्या संवेदनक्षमते मधून…. ! दुसऱ्या माणसाचे दुःख आपल्या काळजाला भिडले की खूप मोठं काम उभे राहते! अशी संवेदनाक्षम माणस हवीत त्या कामाने त्यांना सुख नव्हे समाधान मिळाल आहे… कारण ती निस्वार्थी सेवा आहे… मुलांमधील संवेदना क्षमता आपण जपायला हवी त्यांचे टीव्हीवर खेळले जाणारे खेळ भयानक आहेत बंदुका मारामारी रक्त याला उडव हे क्रुरतेकडे कडे नेणारे आहेत त्यांचे अभ्यासातील धडे सुद्धा माहिती वजा आहेत भाषेच्या पुस्तकात भावना समृद्ध होतील असे धडे हवेत जसे की आमच्या लहानपणी पाडवा गोड झाला. बाळ जातो दुर देशी ही कविता आई ही यशवंत ची कविता दोन मेणबत्ती हा धडा देशभक्त बाबू गेनू चा धडा इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातही गोपाळ सीता सुरेश अहमद त्यांची आई त्यांनी शेजाऱ्यांना केलेली मदत लिटिल मॅच गर्ल भयानक थंडीत ख्रिसमसच्या काळात काड्यापेट्या विकणारी ही मुलगी त्यात थंडीत गोठून मरते हे सगळे धडे माणसातली संवेदना वाढवणारे होते अशा धड्यांची गरज आहे तर ती संवेदनाक्षमता टिकेल. हाणामारीचे चित्रपट मुलांना आवडतात खलनायक हिरो वाटायला लागले आणि असे खलनायकावरती हिरो म्हणून बेतलेले चित्रपट हि आले हे दुर्दैव आहे माणसाची संवेदनक्षमता टिकवण्याचे कार्य मनोरंजनातून शिक्षणामधून साहित्यातून काव्यातून आपल्या घरातून.. घरातल्या मोठ्या माणसांकडून आणि समाजातून होणे गरजेचे आहे त्याबरोबर माध्यमांनी ही काय दाखवावे याचे भान ठेवून हे गुण वर्धिष्णू होतील असे काही दाखवणे गरजेचे आहे आपल्याला काय वाटतं? आपले मत नक्की नोंदवा

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “धरतीवरचा स्वर्ग…” – लेखिका : सुश्री प्रतिभा देशमुख ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “धरतीवरचा स्वर्ग…” – लेखिका : सुश्री प्रतिभा देशमुख ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

(कोकणात जन्म घेण्याचं आपल्या हातात नसतं पण त्या नंत्तर ही कोंकणी होण्याचं किंवा कोकणी माणसांशी एकरुप होण्याच सौभाग्य मात्र नक्की मिळू शकतं. पश्चिम महाराष्ट्रातील एका सरकारी कर्मचारी महिलेची आपल्या कर्मभुमी कोकणाविषयीची सुंदर पोस्ट.) 

माझं जन्म गाव, शिक्षण सगळं सांगली जिल्ह्यातील आहे. पण माझी कर्मभूमी कोकण आहे.. जन्मभूमी म्हणून ओढ आहे, पण मी कोकण शिवाय जगू शकत नाही… मी कोकणाशिवाय राहू शकत नाही… कारण, कारणं तर खूप आहेत..

कोकणात सगळ्या चालीरीती आहेत ना त्या सगळ्या मानवाला आनंदी ठेवणाऱ्या आहेत, जगण्याचा सोहळा करणाऱ्या आहेत…

इथला बाप कधी हुंडा देत नाही, अन हुंडा घेत नाही… त्यामुळे मुलीला जन्म देण्यापूर्वी तपासणी करत नाही.. जन्माला येईल ते अपत्य तेवढ्याच प्रेमाने वाढवतो…

इथं मुलींना सासुरवास नसतो, सून नोकरी करणारी असेल तर, सासू तिच्या हातात डबा तयार करून देते, किंवा सासरे डबा पोचवायला ऑफिस मध्ये येतात हे मी स्वतः पाहिले आहे…

इथली लोकं खूप कष्टाळू आहेत, एक ग्लास तांदुळाच्या पिठीच्या 20 आंबोळ्या(घावन) टाकून घर जेवू घालते इथली बाई..

फणसाच्या अठळ्या शिजवून प्रोटीन देते सगळ्या घराला..

इथला शेतकरी, रस्त्यावर दूध ओतणार नाही, निषेध म्हणून ते दूध गावभर फुकट पोहचवून येईल!

आंब्याचं नुकसान झालं तर रस्त्यावर आंबे नाही फेकणार.. त्याला अन्न म्हणजे पूर्णब्रह्म आहे हे माहीत आहे!

पुरात, वादळात नष्ट झालीत झाडं.. वीजेच्या तारा तुटल्याने महिना महिनाभर वीज नव्हती… पण, आरडाओरडा न करता, एकमेकांनी श्रमदानातून नवीन झाडांची लागवड केली…

एकदा पीक गेलं की शेतकऱ्यांचं एक वर्षाचं नुकसान होतं.. पण, इथं वादळात, 60-70 वर्षांची झाडं उन्मळून पडली, तरीही चिकाटीने नवीन बाग रोवली…

मागच्या वादळातली बाब.. कोरोनामुळे वाहतुकीवर निर्बंध होते, वादळामुळे सगळं ठप्प… मनात विचार केला, की याच जनतेने दिलेल्या महसूल करामधून दरमहा पगार मिळतो, त्यातला थोडा भाग त्यांच्यासाठी देऊ! मग आम्ही ZP तल्या कर्मचाऱ्यांनी/अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन एका रात्रीत 2. 50 लाख रुपये वर्गणी जमा केली, अन त्या लोकांपर्यंत पोचलो अन त्यावेळी त्यांच्या मनातलं जाणलं, हृदय जाणलं!

त्यांचं म्हणणं एकच,”माझ्या पणजोबाची बाग, त्यांनी लावली म्हणून मी खाल्ली, आता मी लावली तर माझे वारस खातील…”

कोकणात मुलगा मुलगी भेदच नाही, पोरापोरींना समान न्याय आहे… मुलीने प्रेम प्रकरण केले तर खानदान की इज्जत जाते वगैरे असे प्रकार इथे फारसे दिसत नाहीत! पोराने परजातीतील मुलीशी लग्न केलं म्हणून त्याचं तोंड आयुष्यभर बघणार नाही, असली फालतू कट्टरता इथं नाही… आपलीच पोरं म्हणून आईवडील त्यांना डोळसपणे समजून घेतात आणि मुलही स्वातंत्र्य मिळूनही संस्कारांच्या बाहेर कधी जात नाहीत. आईवडिलांना कमीपणा देत नाहीत.

येथली लोक बारीकसारीक भांडणावरून कोर्टात जातील पण, खून पडणार नाहीत…

कायद्यावर, प्रशासनावर खूप विश्वास आहे इथल्या लोकांचा… नियमात वागतील अन नियमात काम करून घेतील…

जीव लावणे, घासातला घास देणे हे कोकणात शिकावे..

इथं मी कामानिमित्त रात्री 3 वाजता सुध्दा एकटी फिरले आहे, अजिबात भीती वाटत नाही.. इथं स्त्रीचा खूप सन्मान राखला जातो..

मी स्वतः पाहिलंय, एका माणसाचे दुकानातून घेतलेले गहू, रस्त्यावर सांडले.. तर लोकांनी त्यावर गाड्या न घालता, 3-4 जणांनी गाडी थांबवून उतरून गहू जमा करून भरून दिले!

आम्ही सरकारी कर्मचारी सुध्दा, आपण या जनते साठी आहोत याची जाण ठेवून लोकाभिमुख काम करतो!

सरकारी कर्मचाऱ्यांना किलोभर तांदूळ, 4 आंबे, 2 नारळ, कुळीथ.. ही प्रेमाने दिलेली भेट इथं मिळते… त्यात गरिबांचे प्रेम असते..

भाऊंनो, बाईंनो अशी प्रेमाने हाक असते..

मी 18 वर्षे कोकणात एकटी, माझं लहान मूल घेऊन राहिले, मूलगा आता 21 वर्षाचा आहे… पण, मला कधी इथं असुरक्षित वाटलं नाही… उलट नारळातल्या गोड मलाईसारखा स्नेहच मिळाला.

माझे शेजारी अन माझे कार्यालयातले सहकारी यांनी माझी कधीही अडचण निर्माण होऊ दिली नाही…

मी आजारी असताना औषधे आणून देणे, मी बाहेर असेल तर माझ्या घरात दूध भाजी पोचवणे, गाडी बंद पडली तरी ती त्या स्पॉट वरून नेऊन परत घरापर्यंत आणून देणे… सगळं घरपोच सेवा देणे हे सगळं इथली लोक आपुलकीने करतात…

इथल्या माणसांच्यात निसर्गतःच प्रेम आहे.. ओल्या नारळाची स्निग्धता आहे. हापुस सारखा स्वभावात राजबिंडेपणा आहे.

खळाळत्या झऱ्यासारखं जगणं..

धो धो पावसासारखे प्रेम बरसणार..

हिरव्यागार डोंगर दऱ्या प्रमाणे काळीज हिरवंगार…

अथांग समुद्राप्रमाणे विशाल काळजाची माणसं…

फणसाचे गोड गरे, तशी गोड माणसं..

रातांबे जसे लाल, तशी रंगीत माणसं..

करवंद, जांभळे, तुरट गोड… तशीही काही मंडळी 

गणेशोत्सव, शिमग्याची (होळी) गोष्टच न्यारी… माणसाला वर्षातून बेधुंद होऊन नाचणं हवं, त्यासाठी हे उत्सव..

एकमेकांना मदत करून जीवन जगतात इथली माणसं…

अन मग… मी पण इथलीच झाले आहे… माहेराहून येताना, साखरप्याच्या हद्दीत गाडी आली की माझा श्वास मोकळा होतो..

हातखंबाच्या तिठ्यावरून रत्नागिरीत शिरलं की माझ्या कानात आपुलकीचं वारं भरतं

या मातीत मिसळून जायची तयारी आहे…

मी रिटायर्ड झाले तरी, जग फिरत राहीन पण जग फिरून पुन्हा कोकणातच येईन…

माझं घर आहे इथं…

प्रोमोशन झाले तरी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मध्ये घेईन… पण कोकण नाही सोडणार.

(तळटीप: चांगलं वाईट सगळीकडे असतं, अपवादात्मक बाबी सगळीकडे असतात, पण कोकणात मी खूप सुखी आहे. कारण धरतीवर कुठे स्वर्ग असेल तर तो कोकण आहे.)

लेखिका : सुश्री प्रतिभा देशमुख

रत्नागिरी

प्रस्तुती :  सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ याला जीवन ऐसे नाव ! ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

??

याला जीवन ऐसे नाव ! ☆ श्री सुहास सोहोनी

😄 ०१-५० चढती कमान !

बालपण – शिक्षण – नोकरी – कारकून – प्रमोशन – साहेब – हाताखाली चार हुजऱ्ये –

बायको खुश – मुलं खुश –

इकडे तिकडे चोहिकडे –

आनंदी आनंद गडे…

🌸

🙂५०-६० समाधान !

वरची श्रेणी – पगार – निवृत्ती – निरोप समारंभ – पेन्शन – ग्रॅच्युइटी – मुलगा, मुलगी – दोघंही IT त – चांगली नोकरी – जावई भला – सगळे पाच, सहा आकडी पगार वाले – दोन नातवंडं – साठीशांतीला कधी नाही ते बायकोचे पण कौतुकाचे चार शब्द – स्वतःचा दुमजली बंगला -”समाधान निवास !”

🌸

😊 ६०-७० बोनस !

“साठी झाल्येय् असं वाटतंच नाही तुमच्याकडे बघून !” लोकांचं मत – माझी कॉलर ताठ – मलाही तसंच वाटतं – देवाच्या दयेने तब्बेत छान – काही म्हणता काहीही तक्रार नाही – आता कधी तरी सर्दी, पडसं, खोकला हे पाहुणे अधूनमधून यायचेच – काही वेळा खोकला मात्र हटता हटत नाही – आता सत्तरीही जवळ आल्येय्. मध्येच कोणीतरी मागून ढकलल्यासारखं वाटतं! पण तरीही जगायचा कंटाळा आलेला नाही. देवानं मोठ्या उदारपणानं ही बोनस वर्षं दिल्येत, ती नाकारायची कशी ??

🌸

😔 ७०-८० नाईलाज !

सत्तरी झाली तेव्हाच वाटलं होतं, आता बस् झालं की! आता खरं म्हणजे पोथी गुंडाळून फळीवर किंवा कोनाड्यांत ठेवली जावी, हीच इच्छा. आज्ञा झाली की प्रस्थान कधीही हलवण्याची तयारी आहे. तरी पण आपल्या हातांत काय असतं? मुला-नातवंडांनी मोठ्या उत्साहाने पंच्याहत्तरी साजरी केली. पण, त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून, मी केवळ नाईलाजाने सगळ्यांत भाग घेतला.

दाढी, अंघोळ, यांसारख्या रोजच्या कामांचा सुद्धा आताशा कंटाळा येऊ लागलाय्.

आता कोणतीही गोष्ट केवळ नाईलाज म्हणून करायची !

नाईलाज – नाईलाज – फक्त नाईलाज —

🌸

😖 ८०-९० आत्मनिर्भत्सना !

कशासाठी जगतोय तेच कळत नाही. आता कशातच राम वाटतं नाही. ओझं तरी किती दिवस टाकायचं दुसऱ्यांवर? एकदा आणि एकदाचं संपव रे बाबा !

🌸

😵‍💫 ९०-१०० शापित भूत !

घरातील बाकीचे :

गेले अडीच तीन महिने असेच निपचित पडलेलेच असतात. जवळजवळ वीस-बाविस दिवस हॉस्पिटलमध्ये होते. नंतर डॉक्टरच म्हणाले की आता घरीच घेऊन गेलात तरी चालेल. डॉक्टरी इलाज संपले. आता कळत पण काहीच नाही. काय करायचं आपण तरी? वाट बघणे एवढेच आपल्या हातात !!!

🌸

याला जीवन ऐसे नांव !!

🍁 🍁

© श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ Happy Birthday to… लेखक – श्री सुधीर करंदीकर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

?  विविधा ?

☆ Happy Birthday to… लेखक – श्री सुधीर करंदीकर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

Happy Birthday to – – – – 

आज २४ फेब्रुवारी. मी आज सकाळी आपल्या सगळ्यांच्या म्हणजे अगदी सगळ्यांच्या खास मित्राला Happy Birthday अशा शुभेच्छा पाठवल्या.

आणि आश्चर्य म्हणजे मित्राकडून लगेच म्हणजे अगदी दुसऱ्या क्षणाला – Thanks a lot. We will always be in touch. Keep smiling all the time. असे उत्तर पण आले.

कोण असेल असा हा आपल्या सगळ्यांचा कॉमन मित्र ? Any guess!

One… two… & three… लक्षात येत नाही ना !

अहो, आपल्या सगळ्यांचा म्हणजे – तरुण स्त्री-पुरुष, लहान मुलं मुली, वयस्कर स्त्री-पुरुष, अगदी तान्ही बाळं, असे सगळे सगळे आणि अशा सगळ्यांना रोज दिवसातून अनेक वेळेला भेटणारा आपला जवळचा मित्र म्हणजे व्हॉट्सअप. त्याचा २४ फेब्रुवारी ला वाढदिवस असतो.

Brian Action आणि Jan Koum यांनी २००९ मधे WhatsApp या मित्राला जन्म दिला. आणि २४ फेब्रुवारीला कॅलिफोर्निया मध्ये त्याचे What’s up असे नामकरण करण्यात आले.

व्हॉट्सअप ला मी शुभेच्छा पाठवल्यानंतर उत्तरादाखल व्हॉट्सअप नी सगळ्यांना सांगण्याकरता एक छोटासा संदेश पण मला पाठवला आणि लिहिले, की – तुमचा संपर्क परिवार खूप मोठा आहे, त्या सगळ्यांना माझा हा संदेश अवश्य पाठवा, हा त्यांच्याच फायद्यासाठी आहे.

व्हॉट्सअप चा संदेश असा आहे – 

सुधीर आणि मित्रहो, माझ्या संपर्कात जरूर जरूर रहा. कुणाला काही महत्वाचे निरोप द्यायचे असतील, काही महत्वाची डॉक्युमेंट्स पाठवायची असतील, काही छान फोटो / व्हिडीओ शेअर करायचे असतील, शुभेच्छा द्यायच्या आहेत, मोकळ्या वेळेत मनसोक्त गप्पा मारायच्या आहेत, आमने सामने बोलायचे आहे, किंवा कुणाकडून काही छान माहिती तुम्हाला आली असेल तर ज्यांना ती उपयोगी होईल अशांना ती शेअर करा, वगैरे, अशाकरिता मला अवश्य बोलवा. 24 * 7 तुम्ही क्लिक केलं कि यायला मी तयार आहे.

पण एक सच्चा मित्र म्हणून माझी एक विनंती आहे. तुमची तब्येत छान राहावी / घरच्यांशी घरामधे सगळ्यांशी छान संवाद असावेत, वगैरे, या करता काही पथ्य मात्र आपण अवश्य पाळावीत, अशी माझी विनंती आहे.

ती पथ्य अशी आहेत – कुठलीही गाडी चालवत असाल तर तेव्हा मला बोलवू नका. वॉकिंग करत असाल, ऑफिसचे काम करत असाल, अभ्यास करत असाल, टॉयलेट मध्ये असाल, पूजा करत असाल, जेवत असाल, तर अशा वेळेस मला बोलावू नका. गादीवर आडवे असाल तर मला बोलावू नका, तुमच्याकडे तुम्हाला कुणी भेटायाला आले असेल, तर मला बोलावू नका. कुणाकडून काही माहिती / व्हिडीओ / फोटो तुमच्याकडे आले तर ते धडाधड सगळ्या ग्रुपवर फॉरवर्ड करू नका. कुणाला ते पाठवावेत यावर थोडा विचार करा आणि मगच ते आवश्यक त्या ठिकाणी फॉरवर्ड करा. आणि महत्वाचे म्हणजे मला बोलावण्याचा अतिरेक तर नक्कीच टाळा.

जेंव्हा असा अतिरेक होतो तेव्हा तुम्ही शरीराची काहीही हालचाल न करता एका ठिकाणी तासंतास बसून असता किंवा बेडवर आडवे असता. यामुळे आजार वाढतात, डोळ्यांवर ताण पडतो, आणि रेडिएशन चा त्रास तर वेगळा होतोच.

माझी फेसबुक, गुगल, युट्युब, इंस्टाग्राम या माझ्या मित्रांशी नेहेमीच भेट होत असते. मी वर जे माझे मनोगत मांडले आहेत, तेच त्यांचे पण विचार आहेत. यावर जरूर जरूर विचार करा.

तुम्ही मला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि त्यामुळे आपला चक्क एकमेकांशी असा छान आणि वेगळा संपर्क झाला. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. माझी “मन की बात” पण मला तुमच्याबरोबर शेअर करता आली. आणि तो एक वेगळाच आनंद पण मला मिळाला.

तुमच्या मित्र मैत्रिणींना / नातेवाईक मंडळींना माझे मनोगत जरूर सांगा. त्यांना नक्कीच त्याप्रमाणे बदलायला आवडेल, अशी आशा करतो. शेवटी – “पसंद अपनी अपनी खयाल अपना अपना” हे तर आहेच !

चलो, बाय बाय सुधीर.

तुमचा मित्र – व्हॉट्सअप

मंडळी व्हॉट्सअप नी पाठवलेला संदेश आपल्याच फायद्याचा आहे. आपण सगळे जण यावर जरूर विचार करू आणि अंमलात आणूच आणू. आपल्या सगळ्या ग्रूप्स वर पण जरूर फॉरवर्ड करा.

लेखक : श्री सुधीर करंदीकर

मोबा 9225631100, ईमेल <srkarandikar@gmail. com>

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ती… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ ती… ☆ श्री सुनील देशपांडे

आमच्या आईच्या वयाची (आमची नातवंडं आता रोमँटिक सिनेमा पाहायच्या वयात आलीत) 

तरीही ती आमची लाडकी रोमँटिक हिरोईन.

तिचं नाक नाजुक आणि धारदार होतं?

छे हो नाजूक कसलं, थोडं जाडंच. धारदार तर अजिबात नाही.

तिचे ओठ नाजूक होते?

ते हो नाजूक कुठले आकाराने सुंदर परंतु थोडे जाडेच नाही का? 

जिवणी नाजूक? नाहीच.

डोळे माशा सारखे म्हणजे मीनाक्षी हो! छे ते तसेही नव्हते.

सिंहकटी ? न न् नाही.

मग होतं काय तिच्यात?

आधी तुम्ही ते मासे, त्या चाफेकळ्या त्या गुलाबाच्या पाकळ्या यांचे लोणचे घालून टाका.

सौंदर्याच्या सर्व पारंपरिक कल्पनांना झुगारून देऊन तिने जे आपलंसं केलं

तेच खरं चिरसौंदर्य ठरलं!

ते भावुक, अथांग, काळेभोर डोळे! त्यामध्ये एक खट्याळपणाची झाक!

डोळ्यांचे आणि भुवयांचे विभ्रम!

त्या सुंदर ओठांची मोहक हालचाल! 

त्या नाकाच्या शेंड्यावर बेफिकीरपणाची एक झाक!

त्या भव्य कपाळावरून केस सरकवण्यातील एक वेगळीच विलोभनीयता! 

त्या निरागस चेहऱ्यावरील खोडसाळ हास्य! 

ती अभिनेत्री कधी वाटलीच नाही. तिच्या चेहऱ्यावर जे दिसलं तो अभिनय कधी वाटलाच नाही!

सतत बदलणारे चेहऱ्यावरचे भाव! 

संवादातील आणि गाण्यातील शब्दांना न्याय देणारे ते विभ्रम! ती शब्दांची फेक, आणि त्या शब्दांमध्ये मिसळलेली भावगर्भता!

आमचे काही दोस्त त्या विभ्रमांना अदा असे म्हणत!

परंतु एकदा दाखवलेली अदा पुन्हा परत नाही. सतत नवीन नवीन विभ्रम! 

एकदा सादर केलेली अदा पुन्हा परत नाही, नो रिपीटिशन!

हाता पायांच्या सर्व शरीराच्या हालचालींमधील सहजता, मोहकता! 

 निरागसता, खोडसाळपणा, छद्मीपणा या साऱ्यांचं मिश्रण एका मोहक पद्धतीने सतत चेहऱ्यावर जाणवत राहतं आणि मग तेथून नजर हटत नाही.

मधाळ आणि बालिश या दोन्हीचे अफलातून मिश्रण म्हणजेच 

मधुबाला!!

तिचा वाढदिवस आणि व्हॅलेंटाईन डे या दोन्हीचे एकाच दिवशी असणे हा मधुनवनीतशर्करा योगच की! 

तिचा वृद्धापकाळ काळालाही सहन झाला नसावा म्हणून तरुण वयातच तो तिला घेऊन गेला! 

आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या एका ॲपवर मी एक इमॅजिनेशन टाकली 95 वर्षाची मधुबाला कशी दिसेल? 

पण त्याने उत्तर दिले,

I can’t imagine!

दुसऱ्या एका ॲपला हाच प्रश्न एका वेगळ्या पद्धतीने विचारला 

आज मधुबाला जिवंत असती तर कशी दिसली असती ? 

त्याने रेखाटलेले चित्र यासोबत मी जोडले आहे.

आज मधुबाला जिवंत असती तर ती 93 वर्षाची असती!

त्या चिरतरुण स्मृतीला वंदन! 

तिच्या आठवांचे सतत मनावर बंधन!

अशी मधुबाला पुन्हा न होणे!!!

म्हणूनच वसंत बापट त्यांच्या कवितेत म्हणाले होते 

मधुबाला ती मधुबाला!

© श्री सुनील देशपांडे 

 फोन :९६५७७०९६४०

 ई मेल : [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “आठवणींचा पट…” – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

-☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “आठवणींचा पट…” – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(तेवढ्यात पाठीमागून शाळेतल्या शिक्षिका यायच्या, आणि पट्टीचे फटके मारून स्टेजवरून खाली उतरवायच्या.) – इथून पुढे —– 

मागील दहा वर्षात किमान पाच हजार व्याख्यानासाठी उभा राहिलो असेन….

मात्र अजूनही माईक पुढे गेलो, तरी भीती वाटते…. मागून कोणी तरी येईल आणि पट्टीचा फटका मारेल…. !त्यावेळी केलेल्या चुकांची अजूनही भीती वाटते…

मी केलेल्या चुका या “गुन्हा” नव्हत्या… पण त्या चुकाच होत्या… ! हे आज कळतंय.

आमचे एक गुरुजी होते… ते म्हणायचे, ‘आपल्याला आपली चूक समजली म्हणजे समजा निम्मी सुधारणा झाली… !’ 

‘आपल्याला आनंदी आणि सुखी राहायचं असेल तर कायम माघार घ्यायची, कुणाशी वाद घालायचा नाही… ‘ हे खुद्द ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं आहे.

– – पण माझ्यासारख्या रेड्याला हे काय कळणार ? पण ज्ञानेश्वर माऊली होऊन माझ्या शिक्षकांनी मला हे सांगितलं.

‘बाळा कुणाच्या कर्जात राहू नकोस पण आयुष्यभर एखाद्याच्या ऋणात रहा… ‘ हे सांगणारी माणसं, आता देवा घरी निघून गेली….

देवाचीच माणसं ही… तिथेच जाणार… !

मी अजूनही शोधतोय यांना…

तुमच्या आयुष्यात जर अशी माणसं असतील, तर हृदयाच्या तळ कप्प्यात आत्ताच यांना सांभाळून ठेवा, पुन्हा ते भेटत नाहीत माऊली !

वो फिर नही आते… वो… फिर नही आ…. ते… !!!

गतकाळात केलेल्या या चुका पुसायची मला जरी संधी मिळाली तरी मी त्या पुसणार नाही.

कारण या चुकांनीच मला बरंच काही शिकवलं…

“मान” म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर आधी एकदा अपमानाची चव घ्यावीच लागते…

पोट भरल्यानंतर जी “तृप्तता” येते ती अनुभवण्यासाठी, कधीतरी उपाशी राहण्याची कळ सोसावीच लागते…

आपण “बरोबर” आहोत हे समजण्यासाठी आधी खूप चुका कराव्या लागतात…

जिथं अंधाराचं अस्तित्व असतं, तिथंच प्रकाशाला किंमत मिळते…

पौर्णिमेच्या चंद्राचं कौतुक सर्वांनाच असतं… पण हा चंद्र पाहायला सुद्धा रात्र काळीकुट्टच असावी लागते… ! त्याच्या प्रकाशाला काळ्या मध्यरात्रीचीच किनार लाभलेली असते… नाहीतर दिवसा दिसणाऱ्या चंद्राकडे कोण पाहतं ? आपल्या आयुष्यात आलेल्या काळ्या रात्री आपणही अशाच जपून ठेवायच्या…

आता थोड्याच वेळात उजाडणार आहे; हे स्वतःलाच सांगत राहायचं…

अमावस्या काय कायमची नसते…

बस्स पंधराच दिवसात माझ्याही आयुष्यात पौर्णिमा येणार आहे, हे स्वतःला बजावत राहायचं… ! 

– – आणि पुढे पुढे चालत राहायचं… !!!

नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन, या महिन्यात केलेले काम थोडक्यात सांगतो.

  1. ज्यांना कोणाचाही आधार नाही अशा पाच ताई आपल्या मुलाबाळांसह भीक मागायच्या. या पाचही जणींना कामाला तयार केलं आहे. त्यांना नवीन हातगाड्या घेऊन दिल्या आहेत. 26 जानेवारी या पवित्र दिवसापासून त्यांनी काम सुरू करून भिकेपासून स्वातंत्र्य मिळवले आहे.

भिक्षेकरी म्हणून नाही तर गावकरी म्हणून जगायला सुरुवात केली आहे… भारताचे नागरिक आणि प्रजा म्हणून त्यांना आता ओळख मिळेल… माझ्यासाठी खऱ्या अर्थाने यावेळचा 26 जानेवारी प्रजासत्ताक झाला.! 

  1. रस्त्यावर पडलेली एक ताई, हॉस्पिटलमध्ये उपचार करून हिला बरं केलं. काम सुरू कर भीक मागणं सोड अशी गळ घातली. तिने मान्य केलं. तिची एकूण प्रकृती आणि अशक्तपणा पाहता हातगाडी ढकलणे तिला शक्य नव्हते.

हॉस्पिटलमध्ये तिच्याशी बोलत असताना, बाबागाडीमध्ये बाळाला बसवून एक ताई चाललेल्या मला दिसल्या.

हिच आयडिया मी उचलून धरली, विक्री करायचे साहित्य बाबा गाडीत ठेवून विक्री करायची, बाबागाडी ढकलायला सुद्धा सोपी…

समाजात आवाहन केले, आपणास गरज नसेल तर, तुम्ही वापरत नसाल तर मला बाबागाडी द्या…

बाबागाडीचा हट्ट लहानपणी कधी केला नाही, आज मोठेपणी मात्र मी बाबागाडी मागितली…

“लहान बाळाचा हट्ट” समजून, समाजाने माझा हा हट्ट सुध्दा पुरा केला.

हि ताई कॅम्प परिसरात बाबा गाडीत साहित्य ठेवून बऱ्याच वस्तूंची विक्री करते.

बाबागाडीचा उपयोग बाळाला फक्त “फिरवण्यासाठीच” होतो असं नाही… “फिरलेलं” आयुष्य पुन्हा “सरळ” करण्यासाठी सुद्धा होतो… ! 

  1. मागे एकदा एक परिचित भेटले. मला म्हणाले, ‘घरात काही जुन्या चपला आहेत, तुला देऊ का ?’ 

मी द्या म्हणालो 

त्यांच्या सोबतीने त्यांच्या इतर मित्रांनी सुद्धा घरातल्या नको असलेल्या चपला आणून दिल्या.

आठ दहा पोत्यांमध्ये भरलेल्या या चपलांच्या आता जोड्या कशा जुळवायच्या ? 

चौथी की पाचवीच्या परीक्षेत जोड्या जुळवा असा एक प्रश्न असायचा, माझ्या तो आवडीचा.

आज डॉक्टर झाल्यानंतर सुद्धा जोड्या जुळवा हाच प्रश्न समोर पुन्हा एकदा आला.

मग आमच्या काही भिक्षेकरी मंडळींना हाताशी घेतलं, साधारण निर्जन स्थळी जाऊन सगळी पोती खाली केली… आणि आम्ही सगळेजण लागलो जोड्या जुळवायला… ! 

काही चपला आमच्या लोकांना वापरायला दिल्या, उर्वरित चपला जुन्या बाजारात आमच्या लोकांना विकायला दिल्या.

“चपलीची पण किंमत नाही” असा आपल्याकडे एक शब्द प्रयोग आहे. पण याच चपला विकून, आमच्यातले अनेक लोक भीक मागणे सोडून प्रतिष्ठा मिळवत आहेत.

चप्पलला किंमत असेल – नसेल; पण आमच्या लोकांची किंमत वाढवली ती या पायताणांनीच…! 

माझ्या दृष्टीने या चपलांची किंमत अनमोल आहे…! 

  1. दोन लोकांना ओळखीच्या माध्यमातून स्वच्छता सेवक आणि सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरीस लावून दिले आहे.
  2. रस्त्यावर ते जिथे बसतात रस्त्यावर दवाखाना थाटून वैद्यकीय सेवा नेहमीप्रमाणे सुरू आहे, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणे सुरू आहे, डोळ्यांचे ऑपरेशन करणे, चष्मे देणे, रक्ताच्या विविध तपासण्या करणे, कानाची तपासणी करून ऐकायचे मशीन देणे इत्यादी इत्यादी वैद्यकीय बाबी सुरू आहेत.
  3. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणाऱ्या गरीब रुग्णांना रोजच्या रोज जेवण देत आहोत. पूर्वी भीक मागणाऱ्या लोकांची एक टीम तयार करून त्यांच्याकडून सार्वजनिक भाग स्वच्छ करून घेत आहोत त्या बदल्यात त्यांना कोरडा शिधा देत आहोत, साबण टूथपेस्ट, टूथ ब्रश या सुद्धा गोष्टी पुरवत आहोत.

(सध्या भीक मागणाऱ्या अनेक लोकांना भीक मागणे सोडायचे आहे परंतु अंगात कोणतेही कौशल्य नाही. अशांसाठी एखादे प्रशिक्षण केंद्र तयार करून, त्यांना प्रशिक्षण देऊन, त्यांच्याकडून काही वस्तू तयार करून घेऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यायची; असे स्वप्न गेल्या सहा वर्षांपासून पाहत आहे, अनेक कारणांमुळे ते सत्यात येऊ शकले नाही. परंतु येत्या महिन्याभरात असे प्रशिक्षण केंद्र उभे करण्याची पूर्वतयारी सुरू आहे. याबाबत सविस्तर माहिती काही दिवसात देणार आहे)

असो..

आपण ज्या समाजात राहतो तिथे वय वाढलेल्या लोकांना ज्येष्ठ म्हटलं जातं…

मी ज्या समाजासाठी काम करतो, तिथे वय वाढलेल्या लोकांना म्हातारडा – म्हातारडी थेरडा – थेरडी म्हटलं जातं…

आपण ज्या समाजात राहतो तिथे कुणी गेलं तर, ते देवा घरी गेले, कैलासवासी झाले असे शब्दप्रयोग केले जातात.

आमच्याकडचं कोणी गेलं तर म्हणतात… त्ये मेलं… खपलं 

– – वरील सर्व शब्द; अर्थ जरी एकच सांगत असले, तरीसुद्धा शब्दाशब्दांमध्ये प्रचंड अंतर आहे.

– – हे अंतर आहे… हा फरक आहे फक्त प्रतिष्ठेचा… ! 

हे जे काम आपल्या सर्वांच्या साथीनं सुरू आहे, ते फक्त या शब्दातले अंतर कमी करण्यासाठी…

शब्दातला फरक मिटवण्यासाठी…

“प्रतिष्ठा” नावाचा “गंध” त्यांच्या कपाळी लावण्यासाठी…!!! 

— समाप्त —  

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ३० ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – – ३० ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

वाचन

व्यक्तीच्या जडणघडणीत जसा सभोवतालच्या, आयुष्याच्या टप्प्याटप्प्यावर भेटणार्‍या अनेक माणसांचा प्रभाव असतो तसाच निसर्गाचा, झाडाझुडुपांचा आणि वाचनात आलेल्या पुस्तकांचाही फार मोठा वाटा असतो. नुकताच वाचक दिन साजरा झाला. त्या निमीत्ताने आज मुद्दाम लिहावसं वाटतंय कारण माझ्या आयुष्यात वाचनसंस्कृतीला अपार महत्व आहे. माझ्या मते तर माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात. एक वाचलेली पुस्तके आणि दोन, भेटलेली माणसे.

वाचन हे चांगलं व्यसन आहे. ज्यामुळे माणसाचे मानसिक आरोग्य निरामय होऊ शकतं. ज्या व्यक्तीला वाचनाची आवड असते त्या व्यक्तीचे आयुष्य कधीही कंटाळवाणे होऊ शकत नाही. वेळ कसा घालवावा हा प्रश्न पडत नाही. एकटेपणा जाणवत नाही. कारण पुस्तक हा असा मित्र आहे की जो आपली संगत कधीही सोडत नाही. आपल्या सुखदुःखात तो, त्याच आनंदी, मार्गदर्शक चेहऱ्याने, कळत नकळत सतत आपल्या सोबत असतो.

एका इंग्रजी लेखकाने म्हटले आहे की,

“BOOKS ARE OUR COMPANIONS. THEY ELEVATE OUR SOULS. ENLIGHT OUR IDEAS AND ENABLE US TO THE GATES OF HEAVEN”

कल्पनाशक्ती, ज्ञान आणि शब्दसंग्रह उन्नत करण्याचं एकमेव माध्यम म्हणजे वाचन. कारण पुस्तके ही माहिती आणि ज्ञानाचा समृद्ध स्त्रोत आहेत.

वयानुसार आपल्या वाचनाच्या आवडीनिवडी बदलत जातात. लहानपणी चांदोबा, गोट्या, फास्टर फेणे, जातक कथा, बिरबलच्या कथा वाचण्यात रमलं. कुमार वयात, तारुण्यात, नाथ माधव, खांडेकर, फडके यांच्या स्वप्नाळू साहसी, शृंगारिक, वातावरणात आकंठ बुडालो. शांताबाई, तांबे, बालकवी, इंदिरा संत, विंदा, पाडगावकर यांनी तर कवितेच्या प्रांगणात मनाभोवती विचारांचे, संस्कारांचे एक सुंदर रिंगणच आखलं. धारप, मतकरी यांच्या गूढकथांनी तर जीवनापलिकडच्या अफाट, अकल्पित वातावरणात नेऊन सोडलं. ह. ना आपटे यांच्या “पण लक्षात कोण घेतो.. ” या कादंबरीने तर वैचारिक दृष्टिकोनच रुंदावला. त्यांची यमी आजही डोक्यातून जात नाही. श्रीमान योगी, ययाती, छावा, शिकस्त, पानीपत या कादंबऱ्यांनी इतिहासातला विचार शिकवला. आणि पु. लं. बद्दल तर काय बोलावं? त्या कोट्याधीशाने तर आमच्या मरगळलेल्या जीवनात हास्याची अनंत कारंजी उसळवली. जीवन कसं जगावं हे शिकवलं. विसंगतीतून विनोदाची जाण दिली. व्यक्ती आणि वल्लीच्या माध्यमातून त्यांनी माणसं वाचायला शिकवलं. लक्ष्मीबाई टिळकांची स्मृती चित्रे …कितीही वेळा वाचा प्रत्येक वेळी निराळा संस्कार घडवतात. ही यादी अफाट आहे, न संपणारी आहे. यात अनेक आवडते परदेशी लेखकही आहेत. साॅमरसेट माॅम, अँटन चेकाव, हँन्स अँडरसन, बर्नाड शाॅ, पर्ल बक, डॅफ्ने डी माॉरीअर, जेफ्री आर्चर, रॉबीन कुक.. असे कितीतरी. ही सारी मंडळी मनाच्या गाभाऱ्यात चिरतरुण आहेत कारण त्यांच्या लेखनाने आपली वाचन संस्कृती, अभिरुची, अभिव्यक्ती तर विस्तारलीच पण जगण्याला एक सकारात्मक दिशा मिळाली. त्यांनी आशावादही दिला, एक प्रेरणा दिली.

वाचनाने आमचे जीवन समृद्ध केले, निरोगी केले, आनंदी केले. , कसे? हे बघा असे.

विंदा म्हणतात,

“वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे

रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे…”

कुसुमाग्रज म्हणतात,

“मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा

पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा…”

शेक्सपियर म्हणतात,

” प्रेम सर्वांवर करा, विश्वास थोड्यांवर ठेवा, पण द्वेष मात्र कोणाचाच करू नका. “

किंवा, ” सुंदर फुले हळुवारपणे उमलत असतात तर गवत झपाट्याने उगवते. ” 

साने गुरुजींनी सांगितले,

“खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.. “

हे सारंच विचारांचं धन आहे. अनमोल आहे! अनंत, अफाट आहे आणि हे असं धन आहे की, जगण्याच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्ही स्वतःसाठी वापरा, दुसऱ्यांना द्या ते कमी होत नाही. वैचारिक धनासाठी डेबिट हे प्रमाणच नाही. ते सदैव तुमच्या क्रेडिट बॅलन्स मध्येच राहतं. आणि फक्त आणि फक्त ते वाचनातूनच उपलब्ध असतं. म्हणूनच म्हणतात “वाचाल तर वाचाल”

वाचनाचे अनेक प्रकार असू शकतात. अध्यात्मिक ग्रंथ वाचन, चरित्रात्मक वाचन, कविता, ललित, कथा, कादंबरी, रहस्यमय, गूढ, भयकारी, साहसी, अद्भुत, शृंगारिक, विनोदी, नाट्य, लोकवाङमय, प्रवास, संगीत, अगदी पाकशास्त्र सुद्धा. अशा अनेक साहित्याच्या शाखा आहेत. आता तर डिजिटल वाङमयही भरपूर आहे. ज्याने त्याने आपल्या बुद्धीच्या कुवतीनुसार, आवडीनुसार स्वभावानुसार, वाचावे. पण वाचावे. नित्य वाचावे.

वाचन हे माणसाला नक्कीच घडवतं. प्रेरणा देतं. कल्पक, सावध, जागरुक बनवतं. केसरी आणि मराठा वाचून अनेक क्रांतीकारी निर्माण झाले. सावरकरांच्या कविता वाचताना आजही राष्ट्रभावना धारदार बनते.

वाचन आणि कुठलीही आवड अथवा छंद याचं एक अदृश्य नातं आहे. जसं आपण एखादं झाड वाढावं म्हणून खत घालतो आणि मग ते झाड बहरतं. तसेच वाचनाच्या खाद्याने आवडही बहरते. ती अधिक फुलते. चारी अंगानी ती समृद्ध होत जाते. आवडीला आणि पर्यायाने व्यक्तीमत्वाला आकार येतो.

मात्र जशा नाण्याला दोन बाजू असतात तशाच वाचनालाही आहेत. संगत माणसाला घडवते नाहीतर बिघडवते. वाचनातून अशी काही धोक्याची वळणं जीवनाला विळखा घालू शकतात. पण हे व्यक्तीसापेक्ष आहे. ज्याचे त्यांनी ठरवावे काय वाचावे. या नीरक्षीरतेची रेषा जर वाचकाला ओलांडता आली तर मात्र तो स्वतःची आणि इतरांची जीवनसमृद्धी घडवू शकतो.

कित्येक वेळा जाहिराती, रस्त्यावरच्या पाट्या, भिंतीवर लिहिलेले सुविचार, पानटपरीवरचे लेखन, ट्रकवर लिहिलेली वाक्येही तुम्हाला काहीबाही शिकवतातच. आणि वाचनाची आवड असणारा हे सारं सहजपणे वाचत असतो. आणि या विखुरलेल्या ज्ञानाची फुलेही परडीत गोळा करतो.

मला वयाची पंचाहत्तरी ओलांडली तरी बालवाङमय वाचायला आवडते. मी आजही परी कथेत रमते. रापुन्झेल, सिंड्रेला, हिमगौरी मला मैत्रीणी वाटतात. हळुच विचार डोकावतो, माझ्यासारख्या त्या मात्र वृद्ध होणार नाहीत. त्यापेक्षा त्या आहेत म्हणून माझेही शैशव अबाधित आहे. आजही मी बोधकथेत गुंतते.

भाकरी का करपली? घोडा का अडला? चाक का गंजले?…. या प्रश्नांना बिरबलाने एकच उत्तर दिले ” न फिरविल्याने “.. हे वैचारिक चातुर्य बालसाहित्य वाचनातून मला आजही मिळतं.

” तुपात पडली माशी चांदोबा राहिला उपाशी ” – – या ओळीतला गोडवा माझ्या कष्टी मनाला आजही हसवतो.

बालवयात वाचलेल्या अनेक कविता नवे आशय घेऊन आता उतरतात. आणि पुन्हा पुन्हा मनाला घडवतात.

॥उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले । डोळे तरी मिटलेले अजूनही॥… आज या ओळी मला जीवनाचा नवा अर्थ सांगतात. त्या झोपलेल्या चिऊताईत मला जणू काही मीच दिसते. कुणीतरी मलाच नव्याने जगाकडे, बदलत्या काळाकडे पहाण्याची दृष्टी देते.

वाचनाचा हा प्रवास न संपणारा आहे. शेवटचा श्वास हेच त्याचे अंतिम स्थानक असणार आहे. बाकी सगळं तुम्ही ठेवून जाणार आहात इथेच. कारण ते भौतिक आहे. पण वाचन हे आधिभौतिक आहे. पारलौकिक आहे. हे धन ही समृद्धी, हे विचारांचे माणिक—मोती तुमच्या बरोबर येणार, कारण ते तुमच्या आत्म्याचा भाग आहे…

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “आठवणींचा पट…” – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

-☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “आठवणींचा पट…” – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

नवीन वर्षाचा पहिला महिना…

एक वर्ष आणखी सरलं…

जन्मल्यापासूनचा आयुष्य पट कधी कधी आपोआप समोर ठाकतो.

मनात असो का नसो…. ! 

आयुष्यात केलेल्या भल्या बुऱ्या गोष्टी, नाठाळपणा, अवखळपणा, अजाणतेपणे केलेल्या अनेक चुका आठवतात….

कधी हसू येतं… कधी रडायला होतं… ! 

सारं काही पुस्तकात मांडलंय…

पण पुस्तकाने तरी माझ्या किती गोष्टी झेलायच्या आणि सहन करायच्या ? 

मला आठवतं, मी लहान होतो….

अंगात भरपूर “कळा” होत्या, पण एकही “कला” नाही… ! 

शाळेत गॅदरिंग असायचं…

माझ्या शाळेतली मुलं मुली याप्रसंगी विविध गुणांचे प्रदर्शन करायची…

यावेळी गॅदरिंग चा फायदा घेऊन मी सुद्धा “गुन” उधळायचो… ! 

गॅदरिंग च्या शेवटच्या दिवशी, बक्षीस समारंभ असायचा….. स्टेजवर खुर्च्या लावण्याची तयारी सुरू असायची… त्यात प्रमुख वक्ते, कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे यांच्या खुर्च्या असायच्या.

जमिनीवर उकिडवे बसावे….

तसा मी चप्पल घालून या खुर्च्यांवर बसायचो… आणि काम करणाऱ्या बिचाऱ्या माझ्याच वयाच्या मुलांच्या चुका काढत राहायचो.

एकदा मुख्याध्यापकांनी हे पाहिलं, काही न बोलता त्यांनी हातातल्या पट्टीने मला फोडून काढलं.

तरीही, स्स हा…. स्स… म्हणत मी सरांना विचारलं होतं, सर नुस्ता खुर्चीत बसलो होतो, इतकं का मारताय ? 

‘नालायका, तुला माहित आहे का ? या खुर्च्या कोणाच्या आहेत ?’ 

‘हा सर, आपल्या शाळेच्या आहेत, म्हणून तर बसलो ना… ‘

‘कळली तुझी अक्कल बावळटा, आपले आजचे प्रमुख वक्ते, कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आणि आपल्या महाराष्ट्राचे वैभव जे आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत…

या खुर्च्या त्यांच्यासाठी मांडल्या आहेत… ‘

‘हा मं… ते यायच्या आधी मी बसलो तं काय झालं मं… ‘ मी तक्रारीच्या सुरात, पायाच्या अंगठ्याने जमीन टोकरत बोललो….

सोबत माझं स्स… हा… चालूच होतं.

त्यांना माझा धीटपणा आवडला ? 

की माझी निरागसता ?

माहित नाही….

परंतु त्यांच्या चेहऱ्यावरचा राग निवळला…

ते मला म्हणाले बाळा, ‘प्रत्येक खुर्ची ही खुर्चीच असते… पण त्यावर कोण बसतो; यावर त्या खुर्चीची किंमत ठरते. ‘

‘खुडचीची किंमत काय आसंल सर… ?’ माझा भाबडा मध्यमवर्गीय प्रश्न.

आभाळाकडे पहात ते म्हणाले, ‘आपलं आयुष्य जो दुसऱ्यासाठी खर्ची घालतो, त्या प्रत्येकाला अशा खुर्च्या सन्मानाने मिळतात बाळा… याची किंमत पैशात नाही रे… ‘

‘मला पण पायजे अशी खुडची’ जेवताना मीठ मागावं, तितक्या सहजतेने सरांना मी बोलून गेलो.

‘तुझे एकूण गुण पाहता, हि खुर्ची तुझ्या नशिबात नाही… या खुर्चीत तुला बसायचं असेल तर अंगात काहीतरी पात्रता निर्माण कर… लायक हो… नालायका… !’

हे शब्द आहेत साताऱ्यामधल्या माझ्या शाळेचे, माझ्या वेळेचे मुख्याध्यापक सर यांचे… !

माझ्या याच शाळेने आणि माजी विद्यार्थ्यांनी मला पाच वर्षांपूर्वी जीवन गौरव पुरस्कार दिला….

शाळा तीच… प्रांगण तेच… स्टेज तेच…

मी बदललो होतो… ! 

मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाले होते.

मी अट घातली होती, कार्यक्रमाला आदरणीय मुख्याध्यापक सरच हवेत…

स्टेजवर मी सन्माननीय म्हणून लिहिलेल्या खुर्चीवर आखडून बसलो होतो… पण यावेळी पाय खुर्चीवर नाही, जमिनीवर होते…

संयोजकांना मी विनंती केली होती, जे काही मला द्याल ते मुख्याध्यापक सरांच्या हातूनच मला द्यावं…. ! 

सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं.

माझ्या विनंतीनुसार, मुख्याध्यापक सरांनी मला ते मानपत्र दिलं…

सरांच्या पायावर डोकं ठेवून मी त्यांना म्हणालो, ‘सर मला ओळखलं का ?’

त्यांनी चष्मा वर खाली करून मला ओळखण्याचा प्रयत्न केला… पण नाही… ! 

मी सर्वसामान्य माणूस….

किती विद्यार्थी त्यांच्या हातून गेले असतील… ? 

ते मला इतक्या वर्षानंतर कसं ओळखतील ? आणि मी तरी असे काय दिवे लावले होते त्यांनी मला ओळखायला ? 

देवाला तरी सगळ्याच लोकांचे चेहरे कुठे आठवत असतात… ???

मग मी त्यांना शाळेतल्या दोन-चार आठवणी सांगितल्या…

आत्ता सरांना आठवले….

‘अरे गधड्या… नालायका… मूर्खा… बावळटा… तुच आहेस होय तो DOCTOR FOR BEGGARS?’

मी खाली मान घालून हो म्हणालो… ! 

यावर अत्यानंदाने त्यांनी मला मिठी मारली… ‘

यानंतर सरांचे वृद्ध डोळे चकमक चकमक…. चकाकत होते… ! 

कष्टाने वाढवलेल्या, जगवलेल्या झाडाला पहिलं फळ येतं, तेव्हा शेतकरी ज्या कौतुकाने त्या झाडाकडे बघेल… त्याच नजरेने सर माझ्याकडे बघत होते.

‘मी तुझ्या कामात काय मदत करू ? मी तुला आता काय देऊ ?

ती वृद्ध माऊली, इकडे तिकडे पहात, जुन्या सफारीच्या खिशात भांबावून उगीचच इकडे तिकडे हात घालत बोलली… ‘

जुन्या सफारीची विण उसवली होती…

हे माझ्या नजरेतून सुटलं नाही…

मी खिशात जाणारे त्यांचे दोन्ही हात पकडून बोललो… ‘सर, काही द्यायचं असेल तर हातावर एक छडी द्या… माझी तितकीच पात्रता आणि लायकी आहे सर…. ‘ 

यावर लहान मुलासारखे ओठ मुडपून त्यांनी हसण्याचा प्रयत्न केला…

तो हसण्याचा प्रयत्न होता की रडू आवरण्याचा… ? मला कळलं नाही… ! 

ते म्हणाले… ‘गधड्या…. नालायका… मला वाटलं आता तरी तू सुधारला असशील…

पण तू अजून सुधारला नाहीस रे…. ‘ असं म्हणत माझ्या नावाच्या खुर्चीवर सरांनी मला हाताला धरून बसवलं…. ! 

आता ओठ मुडपून, हसणं आवरण्याची आणि रडणं सावरण्याची माझी कसरत सुरू झाली…

जाताना कानात म्हणाले, ‘आता या खुर्चीवर मांडी घालून किंवा पाय वर ठेवून बसलास तरी चालेल, मी तुला ओरडणार नाही… हि खुर्ची तु कमावली आहेस बाळा… ‘ 

यानंतर ते स्टेजच्या मागे निघून गेले….

यानंतर माझ्या कौतुकाची भाषणांवर भाषणे झाली….

मला यातलं काहीही ऐकू आलं नाही….

मला फक्त ऐकू आले…. ते माझ्या मास्तरचे हुंदके… !!!

———+++++++++———–++++++++

साताऱ्यात त्यावेळी खूप साहित्य संमेलनं व्हायची…

आम्ही दोन चार मित्र या संमेलनाला जायचो…

व्हीआयपी लोकांसाठी तिथे एक कॉर्नर केला होता… त्यावेळी एसी नव्हते, पण कुलर होते…

वर्गात उकडतंय, म्हणून या कुलरचं वारं घेण्यासाठी आम्ही येत होतो, अन्यथा साहित्यातलं आम्हाला काय ढेकळं कळतंय… ? 

निर्लज्जपणे आम्ही खुर्च्यांवर पाय ठेवून कुलरचं वारं घेत बसायचो…

संयोजक मंडळी येऊन मग आम्हाला कुत्रं हाकलल्यागत हाकलून द्यायचे…

——++++++—+++++——+++–+++

एखाद्या कार्यक्रमात पहिल्या तीन रांगा व्हीआयपी साठी असतात… आम्ही पोरं पहिल्या रांगेमध्ये बसायचो… इथूनही संयोजक आम्हाला कानाला धरून उठवायचे… ! 

मागून शब्द कानावर पडायचे… लायकी आहे का तुमची पहिल्या रांगेत बसायची ? 

या सर्व जुन्या बाबी मी अजून विसरलो नाही.

आज किती वेळा मी प्रमुख पाहुणा झालो असेन, अध्यक्ष झालो असेन, वक्ता झालो असेन… पण त्या खुर्चीत बसलो की अजूनही मला भीती वाटते…

मुख्याध्यापक सर येतील पट्टी घेऊन….

आज कित्येक मोठ्या मोठ्या साहित्यिकांमध्ये, अनेक मोठ्या मोठ्या लोकांमध्ये उठबस होते… व्हीआयपी लाउंज मध्ये बसवलं जातं… पण आजही भीती वाटते आपल्याला इथून कोणी उठ म्हटलं तर… ? 

हाताला धरून आज पहिल्या रांगेमध्ये बसवलं जातं…. तरीही माझ्या नजरेत धाकधूक असते… आपल्याला इथून कोणी उठवलं तर… ?

पूर्वी एखाद्या कार्यक्रमांमध्ये माईक चालू असायचा….

कोणाचं लक्ष नाही असं पाहून, मी माईक हातात घ्यायचो… उं… ऐं… खर्र… खिस्स…. फीस्स… असे आवाज काढून बघायचो… माइक वर आपला आवाज कसा येतो ते बघायचो… मीच गालातल्या गालात हसायचो.

तेवढ्यात पाठीमागून शाळेतल्या शिक्षिका यायच्या, आणि पट्टीचे फटके मारून स्टेजवरून खाली उतरवायच्या.

– क्रमशः भाग पहिला

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ महाकुंभ : भक्त, सेवक आणि साधना… लेखिका : सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

💥 मनमंजुषेतून 💥

☆ महाकुंभ : भक्त, सेवक आणि साधना… लेखिका : सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

प्रयागराज येथील महाकुंभ सोहळ्यात तीन दिवस घालवल्यानंतर, तिथल्या त्रिवेणी संगमावर लोटलेला मानवतेचा महासागर पाहिल्यानंतर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे महाकुंभ प्रामुख्याने फक्त दोनच प्रकारच्या लोकांचा आहे, भाविकांचा आणि सेवकांचा! 

खरे भाविक, जे कुणीही न बोलावता श्रद्धेने भरलेले हृदय घेऊन प्रयागराजला येतात मिळेल त्या वाहनाने, प्रसंगी आपली सामानाची गाठोडी डोक्यावर ठेवून मैलोनमैल चालत येतात ते भाविक, जे संगम स्नानासाठी तासचे तास शांतपणे वाट पाहतात, जे गंगाजल भरण्यासाठी आठ दहा मोठे कॅन घेऊन येतात आणि ते भरलेले, जड कॅन मोठ्या कष्टाने वाहून त्यांच्या त्यांच्या गावी नेतात, त्यांच्या स्वतःसाठी नव्हे, तर नातेवाईकांना, शेजाऱ्यांना, सुहृदांना देण्यासाठी. जे रात्री झोपायला खोली मिळाली नाही तर शांतपणे पथारी पसरून नदीच्या काठावर वाळवंटात झोपतात, कसल्याच सुविधा नसल्या तरी ते तक्रार करत नाहीत.

पवित्र संगमात स्नान करताना त्यांच्या मिटलेल्या डोळ्यातून आपसूक पाणी वाहते. गंगेच्या थंडगार प्रवाहाच्या कुशीत ते अश्या निःशंकपणे शिरतात जणू त्यांना पूर्ण खात्री असते की त्या क्षणी गंगामाई त्यांना आपल्या निळसर सावळ्या प्रवाहात अशी अलगद सामावून घेईल जशी एक आई आपल्या बाळाला गर्भात सांभाळते. पाण्यात डुबकी घेऊन जेव्हां ते वर येतात तेव्हा त्यांच्या चेहेऱ्यावरची तृप्तीच सांगत असते की त्यांना पूर्ण विश्वास आहे की त्यांच्या आत्म्यावर साचलेल्या कर्मरूपी धुळीची पुटे त्या स्नानाने वाहून गेली आहेत. गुडघाभर पाण्यात उभे राहून जेव्हा ते सूर्याला अर्घ्य देतात तेव्हां सोनेरी उन्हाने झळाळून निघालेल्या त्यांच्या चेहेऱ्यावरचे संपूर्ण समर्पण भाव पाहण्यासारखे असतात. कुंभ खऱ्या अर्थाने त्यांचा असतो.

परमार्थ निकेतनच्या साध्वी भगवती सरस्वती यांनी म्हटल्याप्रमाणे, खरे भक्त हे फक्त आस्थेसाठी, भक्तीसाठी येतात. त्यांचे पूर्वजही कधीकाळी असेच आले असतील प्रयागला, इथल्याच मऊ वाळूत उभे राहून त्यांनी असेच सूर्योदय पहिले असतील. इथल्याच थंडगार पाण्यात असेच स्नान करताना त्या लोकांनी ज्या प्राचीन मंत्रांचा उच्चार केला होता, त्याच मंत्रांचे, त्याच भाषेतले उच्चार त्यांचे वंशज आजही करतात. गंगेचा शांत, प्रेमळ प्रवाह मात्र तेव्हाही असाच अविरत वाहात होता, आजही तसाच वाहात आहे. बाहेरच्या जगाला महाकुंभ म्हणजे काय हे माहिती नव्हते तेव्हांही हे सच्चे भाविक संगमस्नानासाठी प्रयागला येत होते आणि भविष्यात जग महाकुंभ विसरले तरीही ते इथे येतच राहतील. कारण हा महाकुंभ त्यांच्या भक्तीचा महाकुंभ आहे.

मानवतेचा महासागर हे कुंभमेळ्याचे वर्णन काही आजचे नाहीये. ह्युएन त्संग (Xuanzang) हा प्रसिद्ध चीनी बौद्ध भिक्षू सातव्या शतकात भारतात आला होता. त्याने Great Tang Records on the Western Regions या प्रवासवृत्तांतात भारतातील अनेक ठिकाणांचे, संस्कृतीचे आणि धार्मिक परंपरांचे वर्णन केले आहे. कनौजचा सम्राट हर्षवर्धन याच्या राज्यकाळात प्रयागराज येथे भरलेल्या कुंभमेळ्याचे वर्णन करताना तो म्हणतो की या मेळ्यात हजारो लोक भारताच्या वेगवेगळ्या भागांतून एकत्र आले होते ज्यात हिंदू साधू तर होतेच, पण जैन मुनि, बौद्ध भिक्षू, विद्वान आणि सामान्य नागरिकही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. मेळ्यात धार्मिक प्रवचने, ग्रंथांचे वाचन, आणि विद्वानांचे वादविवाद (शास्त्रार्थ) चालत असत. लोक येथे मानसिक शांती आणि चित्तशुद्धीसाठी येत असत असे ह्युएन त्संग म्हणतो, जे आजही खरे आहे. वरची आवरणे, पेहनावा जरी बदलला असला तरी कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांची आतली भक्ती तीच आहे आणि म्हणूनच महाकुंभ सर्वप्रथम त्यांचाच आहे.

महाकुंभ त्यांचाही आहे, जे इथे काही देण्यासाठी येतात, घेण्यासाठी नाही.

१५, ००० सफाई कर्मचारी, जे दिवसातून चार वेळा नदीकाठ झाडून इथल्या लाखो पाऊलखुणा मिटवून टाकतात, नव्या दिवसाची सुरुवात नव्या पावलांच्या खुणांनी व्हावी म्हणून. १२५, ००० पोलिस, जे प्रयागमध्ये जमलेल्या मानवतेच्या महासागराच्या लाटा अंगावर झेलण्याचे अवघड काम करतात, कधी मार्गदर्शन करतात, कधी संरक्षण देतात, तर कधी शांतता आणि शिस्त राखण्यासाठी ओरडतातही. बचाव पथकातील हजारो स्वयंसेवक, जे नेहमी दक्ष असतात, त्यांच्या कौशल्याची कधीच गरज पडू नये अशी त्यांची आशा असते, पण दुर्दैवाने अशी गरज पडलीच तर ते त्यासाठी सदैव सज्ज असतात. इथल्या ५५० शटल बसचे चालक, जे अखंड फेऱ्या मारून यात्रेकरूंना संगमापर्यंत पोहोचवतात. अनेक मठ, मंदिर, धार्मिक संस्थांचे स्वयंसेवक जे उपाशी लोकांसाठी रात्रंदिवस खपून जेवण बनवतात. थकलेल्या यात्रेकरूंच्या पायांना मालिश करणारे सेवाभावी लोक, धार्मिक संस्थांच्या दवाखान्यांत सेवा देणारे डॉक्टर, पडद्याआड असलेले अदृश्य सरकारी अधिकारी जे अठरा अठरा तास काम करून इथली व्यवस्था सांभाळण्याचे आपले कर्तव्य बजावतात. कुंभ जितका भाविकांचा आहे तितकाच त्यांचाही आहे. सेवकांचा. जे निरपेक्ष भावनेने सेवा देतात त्यांचाही आणि जे कर्तव्य म्हणून सेवा देतात त्यांचाही.

बाकी आपण बहुतेक सारे – कुतूहलापोटी आलेलो असतो. महाकुंभाचा थक्क करणारा आवाका पाहून आपण भारावून जातो. इथली मैलोनमैल पसरलेली तंबूंची नगरे, अशक्यप्राय वाटणाऱ्या ठिकाणी बांधलेली स्वच्छतागृहे, आकाशात घिरट्या घालणारे ड्रोन, नदीकाठी उभारलेली तात्पुरती शहरे, रस्ते, हेलिपॅड वगैरे सुविधा पाहून आपण अचंबित होतो, आपण स्नानही करतो, कदाचित आपल्यापैकी काही जणांना गंगेच्या पाण्याच्या स्पर्शाने भक्तीचा परिसस्पर्शही होतो.

पण मुळात आपण न निखळ श्रद्धावान भक्त असतो, ना निःस्वार्थ सेवा देणारे सेवक.

आपण आहोत घटकाभर थबकून इतिहासाच्या खिडकीतून कुतूहलाने ह्या श्रद्धा आणि भक्तीच्या सोहळ्याकडे डोकावून पाहणारे प्रवासी. आपण उद्या इथून निघून गेल्यावरही महाकुंभ सुरूच राहील, गंगेच्या प्रवाहात छोटा खडा फेकल्यावर उठणारा क्षणिक तरंग आहोत आपण फक्त.

महाकुंभ फक्त एक ‘इव्हेंट’ नाही, तर तो भारताच्या नाडीचा दर बारा वर्षांनी निनादणारा एक ठोका आहे, जो खऱ्या भक्तांना आपसूक ऐकू येतो आणि सेवाभावनेने कार्य करणाऱ्या लोकांना आवाहन करतो.

होय, तुम्ही, मी, आपण बहुतेक जण केवळ पर्यटक आहोत. कुंभ खरा फक्त अश्याच लोकांचा आहे, जे एकतर पूर्ण श्रद्धेने भक्ती करतात किंवा संपूर्ण समर्पण भावाने सेवा देतात!

लेखिका : सुश्री शेफाली वैद्य

प्रस्तुती : मेघ:श्याम सोनावणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares