एखादं गाणं आपल्या आयुष्यात कुठल्या वेळी आपल्या कानावर पडतं त्यावर त्या गाण्याची आणि आपली नाळ किती जुळणार हे अवलंबून असतं असं मला वाटतं. आपल्या मनात त्यावेळी लागलेला एखादा विशिष्ट सूर आणि त्या गाण्याचा सूर जर जुळला तर ते गाणं आपल्या जिव्हाळ्याचं होतं. मग त्याचा राग, त्यातली सुरावट, ते कुणी गायलंय, कुठल्या वेळी गायलंय, त्यातले शब्द, त्याचा अर्थ, या सगळ्या पलीकडे जाऊन ते गाणं आपल्याला एखाद्या जिवाभावाच्या व्यक्तीने, बऱ्याच भेटीनंतर समोर दिसताच आनंदाने बिलगावं तसं बिलगतं. आणि मग पुढे एखाद्या चित्रपटाच्या पार्श्वसंगितासारखं आयुष्यातल्या अनेक प्रसंगात ते गाणं आपल्या मनात त्याच्या विशिष्ट सुरावटीसह रुणझुणत राहतं. अनेक अर्थाने आपल्याला समृद्ध करत राहतं. अशावेळी त्या गाण्याचा मूळ भाव काय, त्याची रचना कशी आहे, कुठल्या प्रसंगात केली आहे, अशा कुठल्याच गोष्टींचा प्रभाव त्यावर पडत नाही. ते गाणं अगदी आपलं आपल्यासाठीच खास झालेलं असतं. आपण आपल्या मनातले, स्वप्नातले विशेष रंग, विशेष सूर त्या गाण्याला दिलेले असतात. आणि त्या भावनेतूनच आपण ते गाणं पुन्हा पुन्हा आपल्या मनात आळवत राहतो.
काही गाणी अशीच मनाला भिडलेली आहेत. त्या त्या वेळी कुठल्या प्रसंगात ती आपल्यासमोर आलेली आहेत ते सुदैवाने माझ्या लक्षात राहिलं आहे. त्यामुळे त्याला अनुसरून असलेला एखादा प्रसंग समोर आला की आपल्या प्ले लिस्टच्या लूपवर टाकल्यासारखी ती आपोआपच सुरू होतात.
पण त्यातलं एक गाणं फार खास आहे. कारण बऱ्याचदा ते मनात रुणझुणत असतं…..
‘भय इथले संपत नाही…’. कविवर्य ग्रेस यांचे अफाट शब्दरचना असलेलं शिवाय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी शब्दबद्ध केलेलं आणि गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गाणं अजरामर ठरेल यात शंकाच नाही. पण या गाण्याची गंमत म्हणजे देवकी पंडित, राहुल देशपांडे यांनी देखील हे गाणं गायलं आहे आणि त्या प्रत्येक वेळी ते तेवढेच प्रभावशाली ठरलं आहे. त्यामुळे ग्रेसांच्या आणि हृदयनाथांच्या प्रतिभेला सलाम करावासा वाटतो.
हे गाणं मी पहिल्यांदा ऐकलं, तो प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहतो. अकरावीतली गोष्ट आहे. स्केचिंग करून घरी परत येताना बरीच संध्याकाळ झाली होती. विठ्ठल मंदिराच्या समोरच्या एका छोट्याशा खाजगी रस्त्यावरून मी आमच्या घराकडे निघाले होते. त्या रस्त्यावर पुष्कळ फुलझाडी आहेत. कारण आजूबाजूला बंगले आणि काही जुन्या अपार्टमेंट आहेत. अगदी कातर म्हणावी अशी ती वेळ. झाडांची स्केचेस काढून आम्ही मैत्रिणी परत घरी निघालो होतो. रात्रीच्या रस्त्यावरच्या लाईटमध्ये झाडांच्या पडणाऱ्या सावल्या किती वेगळ्या दिसतात. या विषयावर मी आणि माझी मैत्रीण गप्पा मारत होतो. या निद्रिस्त सावल्या जास्त मोहक की मूळ झाडं? असा आमचा चर्चेचा विषय होता. गप्पा मारता मारता मधल्या एका टप्प्यावर माझी मैत्रीण दुसरीकडे वळली आणि मग मी एकटीच हळूहळू पावलं टाकत घराकडे निघाले. एकटेपणाने वेढलं तसं दिवसभराचा धावपळीचा थकवा चांगलाच जाणवायला लागला. अगदी थोडं अंतर चालणंसुद्धा नको झालं होतं. त्यात पाठीवर जड सॅक, हातामध्ये मोठं स्केचबुक घेऊन उद्याच्या सबमिशनचा विचार मनात चालू होता.
बाहेरचं वातावरण मात्र प्रसन्न होतं. थंडीचे दिवस होते. हवेत सुखद गारवा होता. रस्त्यावरच्या झाडांमुळे, फुलांचा खूप सुंदर असा मंद वास येत होता. रस्त्यावर बराच शुकशुकाट होता. तुरळक सायकलवरून जाणारे कुणी किंवा बंगल्याबाहेर उभे असणाऱ्या काही व्यक्ती असं सोडलं तर फारशी रहदारी नव्हती. तसाही तो रस्ता खाजगी आणि आतल्या बाजूला असल्यामुळे फारशी वर्दळ त्यावर नसायचीच. त्यामुळे माझा तो लाडका रस्ता होता. त्या रस्त्यावरच एका बंगल्याच्या खाली एक कारखाना होता. कारखाना म्हणजे एक मोठी पत्र्याची दणकट शेड होती आणि त्याला मोठ्या खिडक्या होत्या. आत मध्ये भरपूर लाईट लागलेले असायचे आणि तीन-चार लोकं काहीतरी काम करत असायचे. काय काम करायचे ते माहित नाही पण त्या जागेवर बऱ्याचदा फेविकॉलचा वास यायचा. कसला तरी कटिंगचा आवाज यायचा. तिथे उशिरापर्यंत साधारण नऊ-साडेनऊपर्यंत काम चालायचं. तर त्या कारखान्याचे वैशिष्ट्य म्हणजे कधीही, गडबड, गोंधळ ओरडा नसायचा. पण तिथे संध्याकाळ झाली की कायम रेडिओ विशेषतः आकाशवाणी चॅनल चालू असायचा. आणि त्या रेडिओवरची गाणी रस्त्यावर दूरपर्यंत ऐकू यायची.
त्यादिवशी असाच रेडिओ चालू होता आणि जशी जशी मी त्या कारखान्याच्या जवळ आले तसं माझ्या कानावर हे सूर पडले ‘ भय इथले संपत नाही…’ आणि का कोण जाणे सुरुवातीचे हे शब्द ऐकून मी थबकलेच. हळूहळू जसं ते गाणं पुढे जायला लागलं तशी मी त्याच्यात इतकी रंगून गेले की नकळत मी त्या कारखान्याच्या मागच्या बाजूला असलेल्या चाफ्याच्या झाडाखाली येऊन उभी कधी राहिले ते माझं मलाही कळलं नाही. अगदी शांतपणे कान देऊन जणू झाडांना, गाण्याला किंवा अगदी रस्त्यालासुद्धा माझ्या असण्याचा त्रास होणार नाही अशी काळजी घेत मी ते गाणं ऐकू लागले. वातावरणाची मोहिनी असेल, मनातली स्थिती असेल किंवा आणखीन काही असेल पण त्या गाण्यानं त्या दिवशी मला अगदी अलगदपणे कवेत घेतलं ते आजतागायत. ‘ झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवायचे ‘ हे शब्द माझ्या कानावर पडायला आणि बरोबर त्याचवेळी मी उभ्या असलेल्या झाडावरून चाफ्याचं एक फुल गळून माझ्या पायापाशी पडायला एकच गाठ पडली. त्यासरशी एका विशिष्ट तंद्रीत मी पटकन वर बघितलं. सहज आकाशाकडे लक्ष गेलं. स्वच्छ चांदणं होतं. फुल पडण्याचा योगायोग काहीतरी वेगळाच होता. काय झालं ते कळलं नाही. झाडावरून फुलानं सहजपणे ओघळून पडावं तसं त्या गाण्यानं माझं मी पण बाजूला सारून मला आपल्या कवेत घेतलं. आजही अगदी हे लिहीत असतानासुद्धा मला ती भारावलेली अवस्था आठवते.
नक्की कशाचं भारावलेपण होतं ते माहित नाही. इतकं जाणवलं की हे सूर आपले आहेत. आपल्यासाठी आहेत. आपल्याला आता कायम सोबत करणार आहेत. आणि ते गाणं माझं झालं. त्यानंतर येणाऱ्या अनेक सुखदुःखाच्या प्रसंगात विशेषतः जेव्हा जेव्हा एकटेपणा जाणवतो तेव्हा तेव्हा हे गाणं मला आठवतं. पण वेदना घेऊन नाही तर कसली तरी अनामिक ऊर्जा आणि चैतन्य घेऊन ते गाणं येतं. मला हे गाणं नेहमीच सर्जनशीलतेला उद्देशून म्हटलं आहे असं वाटतं. कदाचित त्यावेळी माझ्या डोक्यात सबमिशनचे विचार असतील ते पूर्ण करण्याचा ताण असेल त्यावर या गाण्यानं थोडं आश्वस्त झाल्यासारखं वाटल्याने असेल. पण मला ते गाणं .. निर्मिकाला निर्मितीचं भय हे कायम व्यापूनच असतं पण तरीही त्या भयाला सहजतेने सामोरं जावं, सश्रद्ध शरण व्हावं मग निर्मिती तुम्हाला पुन्हा संधी देते .. असं सांगणार वाटतं.
…… निर्मिक आणि निर्मिती यांच्यामधल्या निरंतर चालणाऱ्या खेळात निर्मिकाला लाभणारा उ:शाप वाटतं.
☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१४ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
बखळ, आळी, आणि बागा —
‘बोळ ‘ बंधूंचा आप्तस्वकीयांचा पसारा मोठा होता, बोळांना बऱ्याच बहिणी होत्या त्यावेळी बोळ पुढे बंद होत असेल, तर तो बोळ नसून त्याला ‘बखळ’ म्हणायचे. अहिल्यादेवीकडून शनिवारवाड्याकडे आम्ही जायचो ती होती हसबनीस बखळ. टिळक रोड जवळ स्काऊट समोरची म्हणजे (सध्याचं उद्यान प्रसाद कार्यालय) 1957 पूर्वी तिथे इचलकरंजीकरांची बखळ होती. पुण्यातले बोळ प्रसिद्ध होते तशा ‘आळ्या’ही अनेक होत्या. लोणीविके दामले आळी, गाय आळी, शुक्रवारांतील शिंदे आळी, त्याच रस्त्याने थोडं पुढे गेलात ना! की मग तुम्हाला लागेल खडक माळ आळी. गणपतीच्या दिवसात पायांचे तुकडे पडेपर्यंत पहाटे चार वाजेस्तोवर गणपती पहायला प्रत्येक बोळ् आणि अगदी आळीतले सुद्धा गणपती बघायला आम्ही भटकत होतो. या खडक माळ आळीचा भव्य दिव्य गणपती बघताना डोळे विस्फारायचे. कसब्यातील तांबट आळी अगदी डोकं उठवायची. कारण तांब्याची मोठमोठी सतेली, पातेली, टोप, बंब, अशी ठोक्याची भांडी, ते बनवणारे कारागीर कानात बोळे न घालता ठोक ठोक करून ठोकायची. बुधवारातील दाणे आळी, आणि हो विशेष म्हणजे तिथे एकही शेंगदाणा मिळायचा नाही, चोरखण आळीत चोर राहतात का?असा भाबडा प्रश्न विचारल्यावर आम्हाला टप्पल मारून ‘वेडपटच आहेस ‘असा शिक्का मिळून, अग चोर नाही. चोळखण आळी म्हणायचे त्या आळीला. तिथले धारवाडी खण प्रसिद्ध आहेत. तिथेच पुढे विजयानंद टॉकीजची गवळी आळी होती. तिथे एकही गाय गोठा किंवा डेअरी नव्हती. बहुतेक सगळ्या गाई गाय आळीत गेल्या असाव्यात. पूर्व भागांत होती बोहरी आळी, तिथे मात्र बोहारणींचा तांडा जुन्या कपड्यांच्या ढीगात फतकल मारून बसलेला असायचा. नुसता कलकलाट चालायचा जसा काही मासळी बाजारच भरलाय.
तर मंडळी अशी होती ही, काळा आड लुप्त झालेल्या बोळ ‘आळ्या’ बागा आणि बखळींची ची कथा.
सोनेरी रंगाचं टोपण असलेलं काळ्याभोर रंगाचं एक जुनं, देखणं, महागाचं फाउंटन पेन माझ्या वडिलांच्या कपाटातून मला नेहमी खुणावत असे. आपण त्या पेनाने छानसं काहीतरी लिहून बघावं असं मला फार वाटत असे. “पैसे देऊनही आता असं पेन मिळणार नाही” असं बाबांचं मत होतं. त्यांचं ते फार आवडतं पेन होतं. पण मग सातवी, आठवीत गेल्यावर मला फार आवडतं म्हणून ते पेन त्यांनी मला दिलं. आणि कसं कोण जाणे, एका शनिवारी सकाळी शाळेतून परत येताना ते पेन माझ्या दप्तरातून रस्त्यात खाली पडलं, हरवलं.
पेन हरवलं म्हणून बाबा मला रागावतील, ही माझी भीती नव्हती. बाबांचं आवडतं पेन आपल्या हातून हरवल्याचं आणि बाबांना त्याचं वाईट वाटेल याचं मला दुःख होतं. पण पेन हरवल्याचं कळल्यावर बाबा मला म्हणाले होते, “ रस्त्यात पडलं असेल तर मिळेलही कदाचित आणि समज जर नाही मिळालं, तर तू मोठी झालीस की यापेक्षा सुंदर पेन तू माझ्यासाठी आण. अशीही कोणती गोष्ट कायम टिकते? “
त्यांच्या या वाक्यामुळे, पेन हरवल्याच्या दुःखापेक्षा, हरवलेलं पेन परत मिळू शकतं हा आशावाद आणि आपण मोठे झाल्यावर बाबांसाठी सुंदरसं पेन आणू शकू हा बाबांनी दाखवलेला विश्वास मला उमेद देऊन गेला.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मुलांना शाळेत सोडून परत जाणाऱ्या एका पालकांना हे पेन रस्त्यात मिळालं आणि त्यांनी ते शाळेच्या ऑफिसमध्ये जमा केलं. हरवलेलं पेन परत मिळालं.
“वस्तू हरवणे” ही कोणाच्याही आयुष्यात, कधीही घडू शकणारी एक घटना असते. आपल्या चुकीमुळे वस्तू हरवली की एक प्रकारची चुटपुट लागून राहते, काहीसं अपराधीही वाटतं. वस्तू मौल्यवान असेल तर ती आठवण कायमच स्मरणात राहते. अशावेळी वस्तू हरवणाऱ्या माणसाला, “ धांदरट, बेफिकीर” अशी विशेषणं लागू शकतात आणि ती जास्त दुखावणारी असतात. हरवणाऱ्याचा पुढे वाद घालण्याचा, आपली चूक कशी नव्हती हे सांगण्याचा हक्क जवळजवळ संपुष्टात आलेला असतो. आणि जर आपली चूक असेल तर गप्प बसण्याला पर्याय नसतो.
परंतु हरवणं या अनुभवाला इतरही सकारात्मक बाजू असतात हे मला माझ्या बाबतीत घडलेल्या पेन हरवण्याच्या घटनेवरून कळलं. लोकं चांगली असतात, शाळेच्या आवारात मिळालेले पेन त्यामुळेच परत मिळू शकलं हा चांगुलपणावरचा विश्वास तर वाढलाच, पण “ तू मोठी झाल्यावर माझ्यासाठी एक सुंदर असं पेन आण” या बाबांच्या शब्दांनी पेन हरवण्याच्या बदल्यात मला एक “स्वप्न” बक्षीस दिलं. मोठी झाले की मी माझ्या पहिल्या पगारातून, कमाईतून बाबांसाठी एक किंमती पेन विकत घेण्याचं स्वप्न त्यानंतर मी कायम बघितलं आणि ते पूर्ण झाल्याचा आनंदही घेतला.
वस्तू हरवण्याला अशा कितीतरी बाजू असतात. लाकूडतोड्याची कुऱ्हाड लाकडं तोडताना नदीत पडली म्हणजे हरवलीच. देवाने त्याला त्याच्या लाकडी कुऱ्हाडी बदली सोन्याची, चांदीची कुऱ्हाड देऊ केली. पण प्रामाणिक लाकूडतोड्याने ती नाकारली. मग देवाने त्याला त्याची हरवलेली कुऱ्हाड तर दिलीच पण सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाड त्याच्या प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणून दिली. बालपणी ऐकलेली ही भाबडी गोष्ट खरी वाटो, न वाटो पण प्रामाणिक असण्याचा संस्कार करते इतकं नक्की.
इथे मला विशेषत्वाने आठवते ती फ्रान्झ काफ्का ( Franz Kafka) ची गोष्ट. आवडती “बाहुली” हरवली म्हणून रडणारी एक लहानशी, गोड मुलगी तुमच्या, माझ्यासमोर येऊन उभी राहिली, तर आपण काय करू? आपण तिची समजूत काढू, तिला नवीन बाहुली आणून देऊ. पण फ्रान्झ काफ्काने तसं केलं नाही.
काफ्का हा जर्मन कथा कादंबरीकार होता. बर्लिनच्या पार्कमध्ये फिरत असताना त्याला बाहुली हरवली म्हणून रडत असलेली एक छोटी मुलगी भेटली. त्या दोघांनी मिळून बाहुली खूप शोधली. परंतु बाहुली मिळाली नाही. काफ्काने ह्या छोट्या मुलीला दुसऱ्या दिवशी परत बाहुली शोधण्यासाठी पार्कमध्ये बोलावले.
दुसऱ्या दिवशी काफ्काने या छोट्या मुलीला बाहुलीने लिहिलेलं एक पत्र दिलं. त्यात बाहुलीने लिहिलं होतं की ती जगप्रवासाला चालली आहे. आणि ती, या प्रवासाचे वर्णन पत्रातून नियमितपणे ह्या छोट्या मुलीला लिहित राहील.
अशा रीतीने, काफ्काने बाहुलीच्या नावाने लिहिलेल्या जगप्रवासाच्या साहस कथांना सुरुवात झाली. काफ्का ही पत्रे स्वतः त्या मुलीला वाचून दाखवत असे. ज्या पत्रातील साहसकथा आणि संभाषणे त्या मुलीला आवडू लागली.
नंतर बरेच दिवसांनी काफ्काने प्रवास करून बर्लिनला परत आलेली बाहुली ( म्हणजे त्याने विकत आणलेली ) छोट्या मुलीला दिली. “ही माझ्या बाहुलीसारखी अजिबात दिसत नाही, ” मुलगी म्हणाली.
काफ्काने तिला दुसरे पत्र दिले ज्यामध्ये बाहुलीने लिहिले होते : “माझ्या प्रवासाने मला बदलले आहे. ” चिमुरडीने हरवलेली बाहुली मिळाली म्हणून तिला आनंदाने मिठी मारली आणि ती बाहुली घरी नेली. बाहुली “हरवण्याच्या निमित्ताने” छोट्या मुलीने पत्रातून जग बघितलं.
काफ्काच्या मृत्यूनंतर, आता वयाने काहीशी मोठी झालेल्या या मुलीला बाहुलीच्या खोक्यात एक पत्र सापडले. काफ्काने स्वाक्षरी केलेल्या छोट्या पत्रात लिहिले होते:
“तुम्हाला जे आवडते ते कदाचित कधी हरवले जाईल, परंतु दुसऱ्या मार्गाने ते नक्कीच परत येईल. “!!!!
काफ्काची गोष्ट इथे संपते.
हरवलेलं बालपण? हरवलेलं प्रेम? हरवलेलं रूप? असे प्रश्न पडले तर त्याची उत्तरं निसर्ग आणि ऋतू देत असतात. ऋतूंना परत बहर येत असतात. बालपण मुलं, नातवंड यांच्या रूपात आजूबाजूला वावरत असतं आणि आयुष्यातील प्रेम कधीच दूर गेलेलं नसतं. आपली माणसं असतातच आपल्या अवतीभवती, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष !
– – – हे एकदा कळलं की मग हरवणं आणि सापडणं हा केवळ उन्ह सावलीचा खेळ भासतो.
लेखिका : सुश्री माधुरी ताम्हाणे देव
संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
रविवारी घराघरात असते तशीच निवांत सकाळ, सर्व काही अस्ते कदम चाललेलं असताना मोबाईल वाजला. अनोळखी नंबर असल्यानं दुर्लक्ष केलं. काही वेळानं पुन्हा त्याच नंबरवरुन फोन आला तेव्हा घेतला हॅलो, संडे डिश का?”
“हो, बोला सर”
“दर रविवारी वाचतो”
“अरे वा !!, धन्यवाद”
“धन्यवाद कशाला?घरबसल्या मिळतं म्हणून वाचतो. ”अनपेक्षित प्रतिक्रियेनं मला ठसका लागला.
“मी लिहिलयं म्हणून आभार मानले. ”
“आजकाल लिहिणारे सतराशे साठ आहेत. लिहिण्याचं कौतुक सांगू नका. ” काकांचा अजून एक तडाखा.
“नाही सांगत. ”
“आणि चार ओळी खरडल्या म्हणून स्वतःला लेखक समजू नका. ”
“अजिबात नाही”.
“सध्या लिहिणारे जास्त अन वाचणारे कमी झालेत. ”
“शंभर टक्के बरोबर. “
“उगीच हवेत उडू नका”.
“मी होतो तसाच आहे तरीही.. ”
“त्याच्याशी मला काही देणंघेणं नाही. तुमचं संडे डिश हे लिखाण मला ‘नौटंकी’ वाटते ” काकांनी मूळ मुद्द्याला हात घातला.
“डायरेक्ट नौटंकी.. ” आलेला संताप आवरत शक्य तितक्या मृदु आवाजात म्हणालो.
“स्पष्ट बोलण्याचा राग आला का?”
“वाचक देवो भव:”
“फुकट शब्दांची कारंजी उडवू नका. ”
“बरं !!. तुम्ही बोला, मी ऐकतो. ”
“खरंच तुम्ही लेखक आहात की डमी.. ”.. काकांच्या या बोलण्यानं चिडचिड वाढली.
“थोड्या वेळापूर्वी म्हणालात की स्वतःला लेखक समजू नका म्हणून आणि आता तुम्हीच.. ”
“शब्दांचे खेळ करून चुका काढू नका. ”
“राहिलं. उत्सुकता म्हणून विचारतो ‘संडे डिश’ वर एवढा राग?”
“कशाला रागावू. माझा काय संबंध !! कुणीही ‘वाच’ म्हणून बळजबरी, आग्रह केलेला नाही”
“तरीही वाचता”
“हो”
“चला, म्हणजे चांगलं नसेल पण ‘बरं’ लिखाण माझ्या हातून नक्कीच होतंय. करेक्ट ना !!” काय उत्तर द्यावं हे लक्षात न आल्यानं काकांचा गोंधळ उडाला.
“त्यापेक्षा सरळ सांगा की माझ्या तोंडून कौतुक ऐकायचयं. त्याचीच सवय असेल ना”
“असं काही नाही”
“असंच आहे”
“दर रविवारी लेखनाचा रतीब का घालता”
“समाधान आणि आनंद मिळतो म्हणून.. ”
“माईकवरून द्यायला हे उत्तर ठिक आहे. काही पैसे वगैरे मिळतात की नाही”
“त्यादृष्टिनं कधी विचार केला नाही आणि अपेक्षाही नाही. ”
“एवढं लिहून दोन पैशे हाती येत नसेल तर काय उपयोग !! सगळं लिखाण कवडीमोल”
“पसंद अपनी अपनी आणि प्रत्येक गोष्टीला पैशाचं मोजमाप लावायचं नसतं. ” चढया आवाजात मी उत्तर दिलं.
“राग आला वाटतं”
“का येऊ नये. इतका वेळ तोंडाला येईल ते बोलताय. ”
“ एक सल्ला देतो ”.. माझ्या चिडण्याचा काकांवर काहीही परिणाम झाला नाही.
“कसंय, तुमच्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेत. त्याच अनुभवावर सांगतो. कौतुक सर्वांना आवडतं पण टीका नाही. आजकाल तर माणसं वागताना-बोलताना सुद्धा ‘नौटंकी’ करतात. ”
“संडे डिश मध्ये तुम्हांला काय नौटंकी वाटली”
“कथेतली बहुतेक पात्र इमोशनल असतात. भावनिक होऊन निर्णय घेतात. आजच्या जगात जिथं व्यवहार या एकाच गोष्टीला महत्व आहे तिथे असं लिखाण पटत नाही. ”
“अजून काय वाचता ? “
“व्हॉटसपवर येणारं सगळं !!. ”
“म्हणजे तुम्ही व्हाट्सअप विद्यापीठाचे स्कॉलर”
“टोमणा आवडला. एक आगाऊ सल्ला आता रविवारचा रतीब बंद करा. ” काकांचा बॉम्ब.
“आता स्पष्टच सांगतो. लिखाण चालू ठेवायचं की बंद करायचं हे वाचक ठरवतील आणि आता लिहू नका सांगणारे तुम्ही पहिलेच नाहीत. माझे काही हितचिंतकसुद्धा तेच म्हणतात. जेव्हा बहुसंख्य वाचक सांगतील तेव्हाच ठरवू. ” …. अजून बरंच बोलायचं होतं पण उगीचच तोंडातून वेडावाकडा शब्द जायला नको म्हणून फोन कट केला. डोकं भणभणत होतं. संताप अनावर झालेला. वाचकांचे फोन, मेसेजेस नेहमी येतात पण आज आलेला काकांचा फोन वेगळा, अस्वस्थ करणारा, विस्फोटक होता.
—
संध्याकाळी पुन्हा त्याच नंबरवरून फोन. मुद्दाम घेतला नाही. चार पाच वेळा रिंग वाजली. दहा मिनिटांनी पुन्हा फोन आल्यावर तेव्हा नाईलाजानं घेतला. “अजून काही राहिलयं का?”
“सॉरी !! रागावू नका. सकाळी मुद्दाम तुम्हांला चिडवलं. खरं सांगायचं तर संडे डिश आवडीनं वाचतो. ”काकांचा एकदम वेगळा सुर.
“सकाळी तर वेगळंच बोलत होता”
“ते मुद्दामच. मुलांच्या कृपेने पंधरा दिवसापूर्वी वृद्धाश्रमी बदली झाली. आता इथंच कायमचा मुक्काम. आयुष्यभर शिकवण्याचं काम केल्यामुळे बोलायची फार आवड आणि इथ कोणीच बोलत नाही. नातेवाईकांना, घरच्यांना फोन केला तर थातुर-मातुर कारणं देऊन फोन कट करतात. नेमकं काल म्हातारपणावरची ‘रिकामेपण’ ही संडे डिश वाचली अन तुमच्याशी बोलावसं वाटलं म्हणून फोन केला आणि ठरवून तिरकस बोललो. त्यामुळेच तर चक्क चौदा मिनिटं आपल्यात बोलणं झालं. नाहीतर माझ्याशी कोणी मिनिटभरसुद्धा बोलत नाही. म्हणून मीच नौटंकी केली ” …. काकांचं बोलणं ऐकून धक्का बसला. खूप अपराध्यासारखं वाटायला लागलं.
“काका, सकाळी चुकीचं बोललो असेल तर माफ करा. ”
“तुमच्या जागी मी असतो तर तेच केलं असतं. जे झालं ते झालं. आजकाल संपर्क साधणं खूप सोप्पंयं पण माणसचं एकमेकांशी बोलणं टाळतात. ”
“पुन्हा एकदा सॉरी !!आपण फोनवर भेटत राहू. ”
“क्या बात है. जियो !! संडे डिश छान असतात. असच लिहीत रहा. हाच आशीर्वाद !!आणि ऐकून घेतलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद !! “
काकांनी फोन कट केला तरी बराच वेळ फोनकडे पाहत होतो. कधी कधी वस्तुस्थिती आपण समजतो त्यापेक्षा फार वेगळी असते.
आई जाऊन आता ४ वर्षे होऊन गेली. पण आईची आठवण झाली नाही असा एकही दिवस जात नाही. कधी कधी भावूक होऊन आईच्या आठवणीने कासाविस झाले तर बाकीचे म्हणतात, ‘ काय लहान असल्यासारखे करतेस? तुला स्वीकारायला हवं ना? ‘ मग अशाने जास्तच व्यथित व्हायला होते.
अशी अवस्था कितीतरी जणांची होत असेल. पण मग विचार करताना आईभोवती मन पिंगा घालू लागले. आईविषयीचे कितीतरी विचार डोक्यात येऊन गेले.
…. प्रत्येक ठिकाणी देवाला जाता येणे शक्य नसल्याने देवाने आई निर्माण केली.
… स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.
… आईची किंमत जो करत नाही त्याला जगाशी लढण्याची हिंमत होत नाही.
… तसेच आईचा महिमा सांगणार्या कितीतरी कविता आठवल्या … गदिमा, म भा चव्हाण, यशवंत अशा कितीतरी कवींसोबत अलिकडेच कवी अनिल दिक्षीत, उद्धव कानडे आदि कविंच्या भावपूर्ण कविता मन हेलावून टाकतात.
मग वाटले खरच जगात कुठेही गेले तरी आईला किती महत्व आहे ना? मुलांना जन्म देण्याचे सामर्थ्य एका आईतच असते. तसेच त्यांना वाढवणे संस्कार करणे हे काम जबाबदारी न वाटता फूल उमलते तसं, सकाळी दव पडते तसं, सहज नकळत करण्याचे कसब हे एका आईठायीच असते.
वात्सल्य, प्रेम, ममता तिच्या अंगी ठासून भरलेली असते. आणि मग आई ही कोणी व्यक्ती नसून वृत्ती आहे असे वाचल्याचे आठवले. ती एक वृत्ती म्हणजे भावना असल्याने ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राची तर विठ्ठल हे जगत माऊली झाले. अनेक पुरुष संत हे गुरूमाऊली बनले.
…. म्हणजेच आईपण ही वृत्ती खूप अवघड असूनही ती वृत्ती जो धारण करू शकतो तो आई होऊ शकतो.
सगळ्यांच्या आवडी निवडी सांभाळणे, सगळ्यांवर सारखे प्रेम करणे, चुका पोटात घेणे, शी-शू मनात कोणतीही घृणा न ठेवता आनंदाने काढणे, मुलांना हृदयाशी धरणे, चांगल्या-वाईट गोष्टिंचे ज्ञान देऊन चांगल्या गोष्टी मनावर बिंबवणे, सतत काहीतरी मुलांसाठी करत रहाणे, स्वत्व विसरून फक्त देत रहाणे, जिच्या सान्निध्यात आल्यावर सुरक्षित वाटते, लढण्याचे बळ येते असा भक्कम आधार होणे, अशी लाखो कारणे देता येतील जी वरवर अगदी सामान्य वाटतील पण करायला गेले तर किती अवघड आहे हे समजते.
मग ज्या लेकरांची आई लवकर देवाघरी गेली त्या लेकरांना आई बापाचे प्रेम एकट्या पुरुषाने दिले अशी कितीतरी उदाहरणेही पहातो.. म्हणजेच तो पुरूष त्याच्या अंगी असलेले आईपण जागृत करून मुले घडवतो. किंवा मुलांसाठी दुसरी आई आणतो. पण अशावेळी ती आई सावत्र बनते. का? तिच्या अंगी आईपण नसते का? असते तिच्या अंगीही आईपण असतेच पण मनात कुठेतरी दुजाभाव असतो म्हणून स्वत: जन्माला घातलेल्या मुलांवर ती मुद्दाम अधिक प्रेम आदर देते. मग अशावेळी ती नवर्याच्या मुलाची आई होऊच शकत नाही कारण आईपण असणार्या व्याख्येला ती कुठेतरी छेद देत असते.
.. फार कशाला कैकयीने सावत्र पणा जागृत ठेऊन रामाला वनवासात पाठवले हे उदाहरण सगळ्यांना माहित आहेच.
.. तसेच कृष्णाचा सांभाळ करणारी यशोदा, कर्णाला वाढवणारी राधा या खर्या अर्थाने आई झाल्या अशी उदाहरणे पण सर्वश्रृत आहेतच की !!
मग आई, आईपण याचे मोठेपण शब्दातीत असल्याची जाणिव होते. प्रत्येक घरात एक आई असते. तुमची आमची सेम असते पण आमच्या आईसारखी दुसरी कोणीच नाही असे सारखे वाटत रहाते.
तरी देखील दुसर्यांच्या आईत आपली आई म्हणजे त्या आईतील आईपण जाणून तिच्या चरणीही नतमस्तक होते.
ज्ञानेश्वर विठ्ठल इतर गुरू माऊली यांच्यातील आईपणा पाहून ‘ प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे ‘ या उक्तीप्रमाणे त्यांनी किती प्रयत्नामधून हे आईपण आपल्या ठायी आणले असेल ते वाटून त्यांचा हेवा वाटतो.
स्वत: आई होऊनही काही गुण स्वभावत:च अंगी आले तरी आपल्या आईसारखे नाहीच जमत असे वाटून तिचे श्रेष्ठत्व मनातच जाणून तिच्यासारखे होण्याचा मन प्रयत्न करते.
…… असे मातृत्व अर्थात ‘ आईपण ‘ जर सगळ्यांच्या हृदयी आले तर ?
कोणती भेट अखेरची असेल, कोणते शब्द अखेरचे असतील हे माहीत नसण्याच्या काळात आपण आजच्या, आताच्या गोष्टी उद्यावर का ढकलत असतो हे कळत नाही, हे नाकारता येणार नाही!
आपण महाभारतातील एक कथा निश्चित ऐकली असेल… ज्यात धर्मराज युधिष्ठीर एका याचकाला उद्या दक्षिणा घ्यायला ये! असे सांगतात. त्यावर बलभीम आश्चर्याने म्हणतात…. दादाला ते उद्या ती दक्षिणा द्यायला निश्चितपणे जिवंत असतील असा आत्मविश्वास आहे, असे दिसतं! या कथेतून घ्यायला पाहिजे तो बोध माणसं विसरून जातात…. किंबहुना तशी दैवाची योजनाच असावी किंवा आपले भोग!
परिचयातील एखादी व्यक्ती मरणासन्न अवस्थेत असते खूप दिवस. भेटीस जाण्याचं खूपदा ठरतं आणि राहून जातं! घरातली जाणती, म्हातारी माणसं सांगून सांगून थकतात… कर्त्यांना त्यांच्या व्यापातून सवड काढणं होत नाही… मग धावपळ करून अंतिम ‘दर्शना’चा सोपस्कार करावा लागतो… जो कितपत खरा असतो? कुणाचं दर्शन घेतो आपण? की आपण आल्याचं इतरांना दिसावं अशी योजना असते ती?
ज्या व्यक्तीबद्दल नंतर जे बोललं जातं… ते त्या व्यक्तीबद्दल असलं तरी त्या व्यक्तीला ऐकता येत असेल का? कोण जाणे? त्यापेक्षा त्या व्यक्तीच्या हयातीत त्याच्या कानावर हे शब्द पडले असते तर?
एखाद्या व्यक्तीचं कौतुक करायचं राहून जातं….. योग्य प्रसंगाची प्रतीक्षा करण्याच्या नादात. एखाद्याचं देणं द्यायचं राहून जातं…. देऊ की योग्य वेळी असं वाटल्यामुळे.
….. आपल्याकडे प्रेम शब्दांतून व्यक्त करण्याची पद्धत नाही…. पण कृतीतून व्यक्त करायला कुणाची आडकाठी आहे? पण हे सुचत नाही.
मी हे जे काही सांगतो आहे ते आधी कुणी सांगितलं नाही असं नाही! बेकी हेम्स्ली नावाच्या एका ब्रिटीश कवयित्रीने हे तिच्या भाषेत सांगितलंय नुकतंच. तिच्या त्या इंग्लिश शब्दांचं स्वैर भाषांतर इथं दिलं आहे.. शक्य झाल्यास तुम्ही ती कविता स्वत: वाचावी म्हणून… उद्या किंवा आजच!
तुझं माझ्यावर किती प्रेम होतं हे सांगण्यासाठी मी कायमचे निघून जाईपर्यंत वाट पाहू नकोस !
तुझ्या आसवांमधून माझी कीर्ती तू सांगशीलही पण ती ऐकायला मी असायला तर पाहिजे ना?
तुझं माझ्यावरच्या प्रेमाचं गुपित असं राखून ठेवू नकोस…. उद्या सांग किंवा सांगून टाक आजच !
मग मी ही तुला सांगेन तुझ्यातलं चांगलं …. तू कसा आहेस आणि कसं तू मला प्रेरित करतोस ते!
तू ऐकत असतानाच मी तुला सारं सांगेन अगदी हृदयापासून
….. ‘तू होतास’ ऐवजी ‘तू आहेस’ असं म्हणायला आवडेल मला
‘असं आहे’ हे ‘असं असायचं’ पेक्षा कितीतरी सुंदर आहे, नाही?
तुझ्या अस्तित्वाच्या उजेडात मी बोलेन तुझ्याविषयी ….
….. नंतरच्या अंधारात प्रेमाचे शब्द मनालाही ऐकू येत नाहीत!
म्हणून फार तर उद्याच मला सांग जे तुला वाटतं ते, किंवा आजच, आत्ताच का नाही सांगत?
…. कारण … उद्या असेल का आपल्या नशिबात कुणास ठाऊक?
…. कुणीतरी आपलं आहे… हे आपण ऐकत असताना कुणीतरी सांगणं किती महत्त्वाचं आहे नाही?
आठवी इयत्तेत गेल्यानंतर आमच्या शालेय अभ्यासक्रमात थोडा बदल झाला होता. कुशल व्यावसायिक प्रशिक्षण बाबतीतला अभ्यासक्रम होता तो आणि त्यात होम सायन्स, चित्रकला आणि संगीत या तीन विषयांचा समावेश होता माझ्या बहुतेक वर्गमैत्रिणींनी पटापट त्यांच्या आवडीचची क्षेत्रं निवडली आणि नावेही नोंदवली. वेळ मलाच लागला कारण त्या वेळच्या माझ्या व्यक्तिमत्त्वासाठी यातला एकही विषय माझ्यासाठी तसा बरोबरच नव्हता म्हणजे यापैकी कुठल्याही विषयात मला फारशी गती होती असे वाटत नव्हते.
होम सायन्स या शब्दाविषयीही मला त्यावेळी फारशी आस्था नव्हती. माझ्या मते होमसायन्स म्हणजे घरकाम, शिवणकाम, भरतकाम, विणकाम, स्वयंपाक वगैरे… त्यावेळी तरी मला यात काही फारसा रस नव्हता.
चित्रकला हा विषय मात्र मला आवडायचा पण त्या कलेनच मला जन्मतःच नकार दिलेला असावा. माझी चित्रकला म्हणजे मोर, बदक, फारफार तर दोन डोंगरा मधला किरणांचा सूर्य, एखादी झोपडी, त्यामागे नारळाचं झाड आणि समोर वाहणारी दोन रेषांमधली नदी पण यातही सुबकता, रेखीवपणा वगैरे काही नसायचं. आधुनिक कला किंवा ज्याला आपण अॅबस्ट्रॅक्ट वगैरे म्हणतो ते त्यावेळी इतकं प्रचलित नव्हतं नाहीतर माझं हे चित्र कदाचित खपून गेलं असतं. फ्रीहँड, ऑब्जेक्ट ड्रॉइंगच्या वेळी माझी अक्षरशः भंबेरी उडायची. अशावेळी माझ्या प्रिय मैत्रिणी विजया, भारती, किशोरी या मला केवळ करुणेपोटी खूप मदत करायच्या ते वेगळं पण विशेष कौशल्य म्हणून मी चित्रकला हा विषय घेणे केवळ विनोद ठरला असता.
मग राहता राहिला तो संगीत हा विषय. एक मात्र होतं की आमच्या घरात सर्वांना संगीताविषयी खूप आवड होती. विशेषतः भारतीय शास्त्रीय संगीत पप्पांना आणि ताईला फार आवडायचे. ताई सुंदर पेटी वाजवायची. ताईचा आवाज थोडासा घोगरा असला तरी तिला सुरांचं आणि तालांचं ज्ञान उपजतच होतं. ( असे पप्पा म्हणायचे आणि तिने गायनात करिअर करावी असे पप्पांना वाटायचे त्याबाबत आमच्या घरात काय काय गोंधळ घडले हा संपूर्ण वेगळा विषय आहे तर त्याविषयी सध्या फक्त एवढंच.. ) पण या सगळ्याचा परिणाम म्हणजे रात्री झोपताना दिल्ली आकाशवाणीवरून प्रसारित होणारी संगीत सभा आम्ही सर्वजण न चुकता ऐकायचो. त्या शास्त्रोक्त सुरावटीचा झोपेत का असेना पण थोडासा तरी अंमल चढायचा आणि त्यासोबत होणारी ताई -पप्पांची आपसातली चर्चाही मजेदार असायची..
“पपा पाहिलंत? हा कोमल गंधार किती सुंदर लागलाय.. !”
नाहीतर पप्पा म्हणायचे, ”वा! काय मिंड घेतली आहे.. ”
यानिमित्ताने ताना, आलाप, सरगम, सुरावट, कोमल, तीव्र, विलंबित, दृत लय, राग, तीनताल, झपतात या शब्दांची जवळीक नसली तरी उत्सुकता वाटू लागली होती. आपल्याला हे पेलवेल किंवा झेपेल का याविषयीचा विचार त्या क्षणी इतका प्रबळ नव्हता. परिणामी मी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमात संगीत हाच विषय निवडला.
आजही कधी कधी मनात येतं निदान पप्पांनी किंवा ताईने अर्थात मी ताईचा सल्ला मानला असताच असे जरी नसले तरीही मला थोडं योग्य मार्गदर्शन नको होतं का करायला? पण आमच्या घरात हा नियमच नव्हता. “ तुमचे निर्णय तुम्हीच घ्या” हीच प्रथा होती आमच्या गृह संस्कृतीत. “एकतर यश मिळवा, नाही तर आपटा, डोकं फोडून घ्या आणि त्यातूनच शहाणपण मिळवा आणि स्वतःला घडवा हेच तत्व होतं पण त्यातही एक मात्र अदृश्यपणे होतं की यशात अपयशात हे घर मात्र तुमच्याबरोबर आहे हे लक्षात असू द्या. ” या एकाच आशेवर मी संगीत हा विषय घेतला.
एकदाच मी वर्गात ऑफ तासाला “एहसान तेरा होगा मुझपे…” हे गाणं म्हटलं होतं आणि मैत्रीचा मनस्वी आदर राखून आशा मानकर माझ्या पाठीवरून मी गात असताना हात फिरवत होती. तिच्या त्या स्नेहार्द स्पर्शाने तरी सूर-ताला चा संगम होऊ शकेल असा दुर्दम्य आशावाद आशाला वाटला असेल कदाचित त्यावेळी.
जाऊ दे !
पण आम्हाला संगीत शिकवणाऱ्या फडके बाई मात्र मला फार आवडायच्या. तसे त्यांचे व्यक्तिमत्त्व फारसं प्रभावी नव्हतं. मध्यम उंचीच्या, किरकोळ शरीरयष्टी, किंचित पुढे आलेले दात यामुळे त्यांची हनुवटी आणि ओठ यांची होणारी विचित्र हालचाल, नाकीडोळी नीटस वगैरे काही नसलं तरी रंग मात्र नितळ गोरा आणि चेहऱ्यावरची मृदू सात्विकता त्यामुळे त्या मनात भरायच्या. विशेषतः शिक्षकांमध्ये जो दरारा असतो आणि त्यामुळे जे भय निर्माण होते तसं त्यांच्या सहवासात असताना वाटायचे नाही कुणालाच. शिवाय त्या जेव्हा गात तेव्हा त्या विलक्षण सुंदर दिसत. तसा त्यांचा आवाज पातळ होता पण त्या अगदी सफाईदारपणे एकेका सुराला उचलत की ऐकत रहावंसं वाटायचं. पेटीचे सूर धरताना त्यांची निमुळती गोरी बोटं खूपच लयदार आणि सुंदर भासायची.
या संगीताच्या वर्गात आम्ही पाच सहा जणीच होतो. सुरुवातीला त्या राग, रागाची माहिती, सरगम, अस्थायी, अंतरा, वगैरे आम्हाला वहीत लिहून घ्यायला लावायच्या मग एकेकीला प्रश्न विचारून त्या रागाची बैठक चांगली पक्की करून घ्यायच्या. नंतर यायचा तो प्रत्यक्ष गायनाचा सराव. सुरावट त्या गाऊन दाखवायच्या आणि मग सामुदायिक रित्या उजळणी आणि त्यानंतर एकेकीला म्हणायला लावायचे सगळ्यांना. तेव्हा “छान” “सुरेख जमलं” “थोडा हा पंचम हलला बघ” असे सांगायच्या पण एकंदर समाधानी असायच्या. मात्र माझी गायनाची पाळी आली की त्यांचा चेहरा कसनुसा व्हायचा हे मला जाणवायचं. सुरुवातीला माझ्या आवाजाची पट्टी जमवण्यास त्यांना कठीण जायचं. काळी चार, काळी पाच.. कसलं काय?
मग त्या हातावरच तीनताल वाजवत म्हणायच्या, ” हं!असं म्हण. भूपरूप गंभीर शांत रस.. ”
मी हे पाचही शब्द सलग एकापाठोपाठ एक म्हणून टाकायचे. त्यात संगीत नसायचंच. आळवणं, लांबवणं शून्य. फडके बाईंच्या चेहऱ्यावर मला स्पष्टपणे वाचायला मिळायचं, ”का आलीस तू इथे?”
आज हे आठवलं की वाटतं, ” कोण बिच्चारं होतं?” मी की फडके बाई ?”
पण एक मात्र होतं की मला संगीताच्या लेखी परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळत. कुठला राग कुठल्या थाटातून उत्पन्न होतो, कुठला राग कोणत्या प्रहरी गातात, कोणत्या तालात गायला जातो, त्यातले कोमल, तीव्र मध्यम स्वर.. रागाची बंदीश या सर्वांवर मी माझ्या दांडग्या स्मरणशक्तीने किंवा घोकंपट्टीने मात करायची.
“काफी रागातले कोणते स्वर कोमल?”
मी पटकन सांगायची, ” ग आणि नी”. “भूप रागात कोणते सूर व्यर्ज असतात?” “मध्यम निशाद” अशी पटापट उत्तरं मी द्यायचे पण प्रत्यक्ष गाणं म्हटलं की सारे सूर माझ्या भोवती गोंधळ घालायचे. एकालाही मला कब्जात घेता यायचे नाही.
“संगीत” या विषयामुळे माझा वर्गातला नंबर घसरू लागला. प्रगती पुस्तकात कधी नव्हे ते संगीत या विषयाखाली लाल रेघ येऊ लागली. ती बघताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तरी फडके बाई खूप चांगल्या होत्या. त्या माझ्याबाबतीत कितीही हताश असल्या तरी त्यांनी माझं कधी मानसिक खच्चीकरण केलं नाही. मला कधीही सुचवलं नाही की, ” अजुनही तू विषय बदलू शकतेस. “
उलट “राग ओळखा” या तोंडी प्रश्न परीक्षेच्यावेळी वेळी त्या माझ्यासाठी नेहमी सोपी सरगम घ्यायच्या. ” हं ओळख.. सखी मोssरी रुमझुम बाssदल गरजे बरसेss”
संपलं बाई एकदाचं…ही रॅपीड फायर टेस्ट मी पार करायची.
सर्व बरोबर म्हणून पैकीच्या पैकी गुण. गातानाचे मार्क्स मात्र त्या केवळ कॉम्प्लिमेंटरी म्हणून देऊन टाकायच्या.
पण आता मला वाटतं, की फडकेबाईंनाच वाटायचं का की माझा वर्गातला वरचा नंबर केवळ संगीतामुळे घसरू नये. कुठेतरी माझ्या इतर विषयातल्या प्राविण्याविषयी त्यांना अभिमान असावा म्हणून त्या मला कदाचित असेच गुण देऊन टाकत असतील.
संगीत विषयात माझी कधीच प्रगती होऊ शकली नाही हे सत्य कसे बदलणार?
पण पूर्ण चुकीच्या निर्णयाने सुद्धा मला खूप काही शिकवलं मात्र. मी आपटले, डोकं फोडून घेतलं, माझं हसं झालं, मैत्रिणींच्या नजरेत मला ते दिसायचं. मी टोटल फ्लॉप ठरले. आजच्या भाषेत बोलायचं तर माझा पार पोपट झाला.
पण तरीही काहीतरी “बरं” नंतर माझ्या मनात येऊ लागलं होतं. संगीतातल्या अपयशानेच मला एक सुंदर देणगी दिली. संगीत किती विलक्षण असतं! त्याचा शास्त्रोक्त अभ्यास करताना मला प्रत्यक्ष खूप कष्ट पडले असले तरी एक आनंददायी कान त्यांनी मला दिला. गाता आले नाही म्हणून काय झाले? मी संगीत या शास्त्राचा पुरेपूर आनंद ऐकताना घ्यायला नक्कीच शिकले. अनोळखी सुरांची सुद्धा शरीरांतर्गत होणारी काहीतरी आनंददायी जादू मला अनुभवता येऊ लागली. ती किमया मला जाणवू लागली आणि त्यामुळे माझ्या आयुष्याला एक सुरमयी दिशा मिळाली. माझ्यातल्या जिवंत, संवेदनशील मनाची मला ओळख झाली. पुढे पुढे तर आयुष्य जगत असताना मला या संगीतातल्या शास्त्रानेच खूप मदत केली.
सात सूर कसे जुळवावेत, कोणते सूर कधी वर्ज्य करावेत, तीव्र, कोमल, मध्यम या पायऱ्यांवर कशी पावले ठेवावीत, योग्य प्रहरांचं भानही ठेवायला शिकवलं, कधी विलंबित तर कधी द्रुतलय कशी सांभाळावी, धा धिन धिन्ना ता तिन-तिन्रा या तालांचे अपार महत्त्व मला संगीतातूनच टिपता आले. गाता नाही आले पण म्हणून काय झाले? जीवनगाण्याचे मात्र मी बऱ्यापैकी सूरताल सांभाळू शकले. या क्षणी नाही वाटत मला की माझा निर्णय चुकला होता म्हणून! एका चुकलेल्या वाटेने माझ्या अनेक अंधार्या वाटांना उजळवले.
काही वर्षांपूर्वी मी ठाण्याला माहेरी गेले होते तेव्हा भाजी मार्केटमध्ये मला अचानक फडके बाई भेटल्या. एका क्षणात आम्ही एकमेकींना ओळखले. खरं म्हणजे त्यांनी मला ओळखावे हे नवलाईचे होते. एका नापास विद्यार्थिनीला भेटल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडावा हेही विशेष होते. त्यांनी आवर्जून माझी विचारपूस केली. घरी येण्याचे आमंत्रण दिले आणि पटकन् खाणाखूणांसहित घरचा पत्ता ही दिला.
मी बराच विचार करून पण संध्याकाळी त्यांच्या घरी गेले. त्यांच्या घरातले तानपुरे, अंथरलेली सतरंजी, पेटी- तबला पाहून सुखावले. फडकेबाई खूप थकलेल्या दिसत होत्या. वय जाणवत होतं पण गान सरस्वतीचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर तेव्हाही होतं.
त्याच म्हणाल्या, “ माझी मुलगीही आता सुंदर गाते. अगदी तैय्यारीने.. ”
खरं सांगू ? मला क्षणभर काही सुचेचना काय बोलावे? संगीताच्या वर्गात होणारी माझी फजिती मला त्या क्षणीही आठवली. डोळे भरून आले. फडके बाईंनी माझ्या पाठीवर अलगद हात ठेवला. म्हणाल्या, ” नाही ग! तू निश्चितच एक चांगली विद्यार्थिनी होतीस. तुझ्यात शिकण्याची तळमळ होती. त्यासाठी तू प्रयत्नशीलही होतीस. ”
कदाचित त्यांनी त्यांच्या मनातलं बोलायचं टाळलं असेल तेव्हा मीच म्हणाले, ”आडात नाही ते पोहर्यात कुठून येणार?”
मात्र त्या क्षणी मी त्यांच्या पायाला स्पर्श केला. गुरुपादस्पर्शाचा एक भावपूर्ण प्रवाह अनुभवला. गुरु-शिष्याचा वारसा नाही राखला पण मान राखला. माझ्यात नसलेल्या आणि त्यांच्यात असलेल्या कलेला केलेलं ते वंदन होतं.
“ बाई ! माझ्यासाठी तुमचं ऋण न फिटण्यासारखं आहे. काय सांगू? कसं ते? “
‘ मी डॉक्टर, मी इंजिनीयर, मी वकील,मी शिक्षक, मी एम.बी.ए.,मी शेतकरी, मी ऑफीसर,मी दुकानदार, मी एम. ए. पीएच डी डॉक्टरेट मिळवली – – ‘
‘वा वा अभिनंदन अभिनंदन.. अरे वा म्हणजे बरचं शिक्षण झालय तुमचं. व्यवसाय चांगला करताय आता इतकं शिकलात तर तुम्ही हुशारच असणार म्हणा .. मग एक विचारू का?
— मी एक छोटी परीक्षा घेते .. काही वाक्य विचारते .. ती म्हणायला शिकलात का? पण खरी उत्तरं सांगा हं …..
बायकोला कधी हे म्हणालात का?–
” तू संसार चांगला केलास, घर नीट ठेवतेस, तुझी रांगोळी रेखीव असते, स्वयंपाकात सुगरण आहेस, सगळ्यांची सेवा करतेस, घर आणि नोकरी ही तारेवरची कसरत केलीस, नाती जपलीस “
….. तशी ही यादी मोठी आहे. तूर्तास या साध्या सोप्या प्रश्नांची तर उत्तरं द्या ‘
‘ अरेच्चा एकदम गप्प का झालात ? आत्ता आठवत नाहीये का..? वाटलं तर विचार करून थोडा वेळ घेऊन उत्तरं द्या ….
काय म्हणताय ….. ‘ हे तेवढं राहिलं….’…… असं कसं बरं झालं…? हेच नेमकं शिकायच राहिलं ?
का हा विषयच ऑप्शनला टाकला होता का.. याचा अभ्यास केला नाही….. बरं .बरं..असू दे असू दे.
होत अस बऱ्याच जणांचं … ‘
मग आता करा की हा कोर्स …. पोस्ट ग्रॅज्युएशन नंतरही हे शिकता येतं … वयाची तर काहीच अट नाही
ऑनलाइन.. करस्पॉन्डन्स.. सिलॅबस…. ते तुमचं तुम्ही ठरवायचं किती दिवसांचा आहे … कधी पूर्ण होईल … परीक्षा कधी आहे ???
…. सांगते सांगते… सगळं नीट सांगते
… तुम्ही कसा अभ्यास कराल त्याच्यावर हे अवलंबून आहे … परीक्षेची वेळ तुमची तुमची …
रिझल्ट ताबडतोब समोर प्रत्यक्ष दिसेल …
आणि फी….सांगते ना…..
एकदम किती प्रश्न विचारता?
आणि हो … हा प्राथमिक कोर्स झाला …. असे बरेच आहेत …
हळूहळू त्याची पण माहिती देईन .. सध्या तरी इतकं पुरे
विचार कसला करताय…. हुशार आहात जमेल तुम्हाला … घ्या की अॅडमिशन
आधीच उशीर झालाय राव … करा अभ्यासाला सुरुवात …
…. अरे एक सांगायच राहिलं .. याची गाईड बाजारात नाहीत .. हा विषय स्वयंशिक्षणाचा आहे
हवी असेल तर मी मदत करीन. मला फी पण नको .. मग लागा तयारीला .. प्रॅक्टीस केली की जमेल
आणि हो … रिझल्ट लागला की या पेढे घेऊन ..वाट बघते……ऑल द बेस्ट !! ‘
…….
साने काका घरी आले होते .. काकांनी हे वाचलं आणि हळुवार आवाजात म्हणाले
‘ मी त्या कोर्सला अॅडमिशन घ्यायच्या आधीच नापास झालो आहे ..
ही वर गेली .. आता हे सांगायच राहून गेलं. मला कधी सुचलंच नाही बघ .. नेहमी गृहीत धरलं तिला सगळ्या बायका हेच तर करतात त्यात काय विशेष .. त्याचं काय कौतुक करायचं असं मला वाटायचं ती असेपर्यंत कधी त्याची किंमत कळली नाही तुला एक सांगू .. तू त्या कोर्समध्ये अजून एक विषय ॲड कर …
… आयुष्यात कधीतरी ” माझं तुझ्यावर प्रेम आहे ” .. हे बायकोला एकदा तरी सांगा असं लिही ….
ती गेली आणि मग मला समजलं माझं तिच्यावर प्रेम होतं…”
हे बोलता बोलता त्यांचा आवाज विलक्षण कापरा झाला होता..
” काका खरं तर आम्हा बायकांना ते न सांगताच माहीत असतं जाणवतही असतं….
आतल्या आत…”
“असेल …कदाचित तसही असेल…”
“तरीपण बोलुन दाखवल तर आनंद होईल की नाही ?..”
“हो हे तुझं अगदी पटलं मला ”
“आजारपणात तुम्ही काकूंची काळजी घेत होता … तेव्हा त्या मला म्हणाल्या होत्या …’ यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर.. कसं होईल ग यांच माझ्या नंतर…’.
” हो खरंच असं म्हणाली होती ती?…”
” हो काका…..”
……. काकांचे डोळे भरून वहात होते……
पंच्याऐशींच्या सानेकाकांना समाधान व्हावे यासाठी खोटं बोललं तरी देव मला माफ करणार आहे……
आज सकाळीच महिन्याचे वाणसामान आले होते. त्यातील बरेचसे खराब होईल म्हणून फ्रीज मध्ये ठेवण्यासारखे होते. त्यासाठी मी चक्क बैठक मारून फ्रीज च्या पुढेच बसून विचार करत होते. इतक्यात माझ्या एका जवळच्या मैत्रीणीची मुलगी नीता खास आम्हाला भेटायला आली. ही स्वतः इंजिनिअर आणि उच्चपदस्थ असून ही अतिशय टापटीपीने संसार करणारी आणि सासू सासऱ्यांची लाडकी सून.
माझा एकंदरीत अवतार बघून म्हणाली, ” मावशी काय ग हा पसारा मांडून बसली आहेस? “
मी तिला माझी व्यथा ( हो व्यथा च तर काय…) सांगितल्यावर म्हणाली,
” रागावू नकोस मावशी, पण म्हणूनच आम्ही हल्ली minimalism lifestyle अंगिकारली आहे. म्हणजे काय तर, कंजूष पणा नाही . पण शक्यतो जेवढे लागेल तेव्हढेच आणायचे. आधी प्लॅनिंग केले की छान जमते. अवास्तव पसारा वाढवायचाच नाही. तू पण पुढल्या महिन्यापासून काकांना तशी लिस्टच काढून दे.” मला ही हे पटले. काका तर काय (मिशीतल्या मिशीत) हसतच होते.
गप्पा मारता मारता तिने येताना आमच्यासाठी आणलेला इडली सांबारचा नाश्ता केला. दुपारच्या जेवणासाठी ही मस्त रस्सा भाजी घेऊन आली होती. त्यामुळे मस्त मनसोक्त गप्पा मारल्या आणि आमची बॅटरी चार्ज करून गेली सुद्धा……
जाताना मला मात्र food for thought देऊन गेली.
ती गेल्यावर मी माझ्याच दोघांनी सुरु केलेल्या आणि आता पुन्हा दोघांवरच येऊन ठेपलेल्या संसाराकडे त्रयस्थपणे नजर टाकली. एक सर्कल पूर्ण झाले होते….
अक्षरशः दोन बॅग्ससह सुरु केलेल्या संसाराचा केवढा हा पसारा….आता खरच आवरायला हवा.
Minimalism स्वीकारायलाच हवे….
आणि मग डोळ्यासमोर आली एक एक घरातील वस्तू….
कपड्यांनी खचाखच भरलेली कपाटं, पुस्तकांनी भरलेले शेल्फ, हौस हौस म्हणून घेतलेले तर्हेतर्हेचे क्राॅकरी सेट्स, भांडीकुंडी हे सारेच आता कमी करायलाच हवे….
अनावश्यक वस्तूंचे Minimalism….
मग मनाशी विचार आला, वस्तूच काय….आपण स्वतःकडून आणि इतरांकडूनही किती अपेक्षा ठेवतो.
मी ह्यावेळेस असे वागलेच पाहिजे, हे केलेच पाहिजे……
मुलांनी, नातेवाईकांनी माझ्याशी असे वागावे, असे वागू नये….
नुसत्या अपेक्षाच नव्हे तर तसे घडले नाही तर मनस्ताप ही होतो. मग डिप्रेशन, बिपी ,शुगर मध्ये वाढ…
कशासाठी हे सारे???
त्यांच्याही काही अडचणी असतीलच की ….म्हणूनच आताची मुलं म्हणतात तशी प्रत्येकालाच त्याची space देऊया.
आपली मुलं, आपल्या मित्र मैत्रीणी ,जीवाभावाचे नातेवाईक ह्यांच्यावर आता निरपेक्ष प्रेम करण्याची वेळ आली आहे.
हेच तर अवास्तव अपेक्षांचे Minimalism….
हे दुष्टचक्र एवढ्यावरच थांबत नाही. मग सुरू होतात राग/ रुसवे…….
मीच का साॅरी म्हणू ? गरज तिला/त्याला ही आहे…अशा नको त्या मानापमानाच्या कसरती!
ह्यातून निष्पन्न होतो तो फक्त नात्यात दुरावा…
ह्या सगळ्यावर उपाय एकच राग / रुसव्या चे Minimalism!
आपल्या ह्या संसारातून परमेश्वरही सुटला नाही आहे बरं का….
कोणतेही व्रत, नामस्मरण करताना आपण ते निरपेक्षपणे किती करतो हा प्रश्न स्वतःलाच विचारायला हवा. काहीही मागितले नाही तरी फक्त, ” आम्हा सगळ्यांवर तुझी कृपादृष्टी असू दे” एवढे तरी मागणे असतेच.( खरंतर लांबलचक लिस्टच असते…)
आता येणाऱ्या नवीन वर्षात मात्र शांतपणे परमेश्वराचे मनापासून नामस्मरण करुया आणि खरच minimalism lifestyle जगण्याचा प्रयत्न करुया.
अवघड आहे (कारण अनेक गोष्टीत आपली भावनिक गुंतवणूक असते…) पण अशक्य नक्कीच नाही.