मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वयाची सत्तरी पार करतांना !!… अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ वयाची सत्तरी पार करतांना !!… अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

वयाची सत्तरी पार करतांना !!

एकदा एका पासष्टी ओलांडलेल्या आणि सत्तरीच्या वाटेवर असणाऱ्या मित्राला त्याच्या मित्राने विचारले,   “मित्रा, तुझ्यात काय बदललंय असे तुला वाटतंय?” त्यानंतर त्या मित्राने जे उत्तर दिले ते आपल्यातील प्रत्येकाने समजून घेतलं तर प्रत्येकासाठी आपले आयुष्य सुसह्य होईल हे निश्चित ! त्याने जे उत्तर दिले ते असे…

१. आजवर मी माझ्या आईवडिलांवर, भावंडांवर, मुलांवर, बायकोवर, सहकाऱ्यावर, शेजाऱ्यापाजाऱ्यांवर, मित्रांवर खूप प्रेम केले, त्यांची खूप काळजी घेतली. पण आता मी स्वतःवर प्रेम करायला लागलोय, आता मी स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात केलीय.*

२. मला याची जाणीव झालीय की, आता मी शारिरीक किंवा मानसिकदृष्ट्या इतका सक्षम राहिलो नाही की कुणीही यावं आणि त्यांनी आपले ओझे माझ्या खांद्यावर टाकावे.*

३. आता मी भाजीवाल्याशी, फळविक्रेत्याशी, फेरीवाल्याशी घासाघीस करायचं सोडून दिलंय. उलट आता मला असं वाटतं की माझ्या काही पैश्याने त्यांच्या मुलांचे शिक्षण होणार असेल किंवा त्याची गरीबी दूर होणार असेल तर चांगलेच होईल ना ! *४.आता मी माझ्या जीवन संघर्षाच्या कहाण्या इतरांना सांगण्याचं आणि सल्ले देण्याचं बंद केलंय. कारण एकतर त्या सगळ्यांना सांगून झाल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या आता कदाचित कालबाह्य झाल्या आहेत. माझ्या त्या संदर्भांचा आजच्या पिढीला किती उपयोग होईल हे माझे मलाच माहीत नाही.*

५. आता मी कुणाला त्याच्या चुका सांगण्याच्या किंवा काय बरोबर आणि काय चुकीचे हे सांगण्याच्या भानगडीत पडत नाही.‌ कारण सगळ्यांना सुधारण्याची जबाबदारी माझी एकट्याची नाही हे मला कळून चुकलंय. आता मला इतरांच्या परफेक्शनपेक्षा माझी शांतता अधिक महत्वाची वाटते.*

६. आता मी समोरच्याच्या चांगल्या गोष्टीसाठी त्याला निखळ दाद द्यायला आणि त्याचे कौतुक करायला शिकलोय. त्याने समोरच्याला बरे वाटते, तो सुखावून जातो.*

७. आता माझ्या अंगावरच्या कपड्यांची घडी चुरगाळलेली असेल किंवा शर्टावर एखादा डाग पडला असेल तर त्याचा मला खूप फरक पडत नाही. जे लोक मला अंतर्बाह्य ओळखतात त्यांच्यासाठी माझा पेहराव फार महत्वाचा नाही हे मला कळून चुकलंय.*

८. ज्यांना माझी किंमत नाही अशांकडे मी आता दुर्लक्ष करतो. कारण त्यांना माहित नसली तरी मला माझी किंमत चांगली माहिती आहे.*

९. आता माझं वय कुरघोड्या करण्याचं राहिलेलं नाही.*

१०. आता मला माझ्या भावना व्यक्त करायची लाज वाटत नाही. भावना असणं हे जिवंतपणाचे लक्षण आहे. आता हसावंसं वाटलं की हसून घ्यायचं आणि रडावंसं वाटलं की रडून घ्यायचं. भावना लपवण्याच्या नादात उगाच घुसमटत रहायचं नाही.*

११. आपला अहंकार आपल्या नात्याच्या आड येणार नाही याची मी पूर्ण काळजी घेतो. प्रसंगी मला थोडा कमीपणा घ्यायला लागला तरी मी एकवेळ तडजोड करतो, पण स्वतःचा स्वाभिमान सांभाळून ! कारण नाते टिकवण्याची जबाबदारी कुणा एकाची असूच शकत नाही.*

१२. आता मी येणारा प्रत्येक क्षण सर्वार्थाने जगण्याचा प्रयत्न‌ करतो. मला जे करावसं वाटतं ते मी करतो. फक्त एवढंच की, माझ्या स्वछंदी जगण्याचा इतरांना त्रास होणार नाही याची मी काळजी घेतो. 

१३. मला माहित आहे की, जे मी आजवर जगलोय त्यापेक्षा आता माझ्याकडे वेळ फार कमी आहे. त्यामुळे आज मी ना भूतकाळात जाऊन पश्चात्ताप करत बसत, ना भविष्यकाळात जाऊन चिंता करत बसत… आता निख्खळ आणि निख्खळ जीवनाचा आनंद घ्यायचा आणि जेवढा इतरांना देता येईल तितका द्यायचा…!!*

*आता माझं उर्वरित आयुष्य पैसे मिळवण्यासाठी नसून परोपकारासाठी असल्याची भावना मनात निर्माण झाली आहे.*  

*आता लक्षात आले आहे की, संकटात असलेल्या व्यक्तीला मदत नाही केली तर तो तक्रार न करता देवासमोर जावून रडतो. त्याचा तळमळलेल्या आत्म्याचा आवाज कानात ऐकू येत असलेली भावनाही मनात येते.*

खरंच, वर दिलेल्या एका मित्राच्या उत्तरातून आपण काही समजून घेतलं तर आपल्यातील प्रत्येकाला किती छान जीवन जगता येईल ना?

आत्ता  कळले जीवन सुंदर आहे. पण ते सरळमार्गाने जगणाऱ्या व्यक्तीचे आहे.

खूप खूप शुभेच्छा सत्तरीच्या.वाटेवर असणाऱ्या मित्रांना !!

लेखक : अज्ञात

संग्राहक : श्री अनंत केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी, तिळगुळ आणि संक्रात…एक संवाद… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ मी, तिळगुळ आणि संक्रात…एक संवाद… ☆ सौ राधिका भांडारकर

मी—-अगबाई ! नवं वर्ष उगवलं.जानेवारी महिना सुरु झाला. आता संक्रातीचे वेध लागले.   .स्वच्छ तीळ चिकीचा गुळ आणायलाच हवा..शिवाय सुगडी..बोरं ऊस आवळे..कितीही ठरवलं ना या वेळेस चितळेकडूनच आणूया लाडू, आता नाही हो होत…पण मन नाही ना मानत..नाही म्हटलं तरी  संस्काराची मुळं नाही सुटत हो..

पण अधिक माहिती देण्यासाठी संक्रात आणि तिळगुळ माझ्या घरीच आले आहेत..अम्मळ बोलूच या का त्यांच्याशी..

“ काय म्हणताय् तिळगुळजी..? ”

*तिळगुळ..*— “ सर्वप्रथम मी तुझं कौतुकच करतो की या वयातही तू अजून तिळगुळ घरी बनवतेस…

संक्रात — “ अरे पण तुझं महत्व सांग ना..” 

तिळगुळ— “ हे बघ तीळ आणि गुळाचं बंधन म्हणजे मी..तिळगुळ. हेमंत ऋतुत येते संक्रांत..थंडीची शिरशिरी..तीळ हे उष्णवर्धक , स्निग्ध. शिवाय त्यातली अमीनो प्रथीने ,लोह शरीरास पोषक असतात. गुळातही सुक्रोज आणि ग्लुकोज  आणि लोह असते. ते शरीराचे तपमानही राखते अन् कांतीही सतेज राहते…म्हणून संक्रातीला माझे महत्व असते बरं का? शिवाय स्नेह आणि मैत्रीचे मी प्रतीक. राग हेवे दावे विसरून जायचे. नवे स्नेहसंबंध प्रस्थापित करायचे..तीळगुळ घ्या गोड बोला म्हणत आनंदाचे, प्रेमाचे बंध जोडायचे..”

मी— “ किती छान !!आपल्या भारतीय सणातली ही तत्वंच महत्वाची..”

*संक्रांत.*— “ अगदी बरोबर !”

मी— “ पण संक्रातबाई,,”काय बाई संक्रांत आली माझ्यावर..”असं लाक्षणिक अर्थानं ,थोडंसं कडवट का बरं 

बोलतात ?”

संक्रांत— “ कारण यावेळी एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करणं असतं ना..१४जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.आणि या भ्रमणास मकर संक्रांत असं म्हणतात. याचवेळी उत्तरायण सुरु होते. हा काळ धर्म परंपरेच्या दृष्टी कोनातून अत्यंत महत्वाचा आणि पवित्र मानला जातो. अन्न ,वस्तु यांचं दान केलं जातं.. सूर्याची पूजा केली जाते. शुक्राचाही उदय होतो.. “

मी — “ भारतात संक्रातीला वेगवेगळी नावेही आहेत ना..?”

संक्रांत – “हो .तामीळनाडुत पोंगल असतो. बिहार मधे तर मला खिचडीही म्हणतात…”

मी — “ खिचडी?”

संक्रांत — “ हो. कारण या दिवशी तूर मसूर तांदळाची खिचडी बनवून खायचीही प्रथा आहे. तिळाचे लाडू, वड्या, रेवडी, गजक, गुळपोळी या खाद्य पदार्थांची तर रेलचेलच असते…”

मी— “ वा !! किती छान माहिती मिळाली. भारतीय सण म्हणजे नुसतीच संस्कृती किंवा परंपरा नव्हे, त्यामागे शास्त्रीय विचार आहे. बदलणार्‍या ऋतुमानाचा आणि मानवी जीवनाचा केलेला वैज्ञानिक अभ्यास आहे…मग स्त्रियांसाठी हळदीकुंकु, वाण वाटणे ,लहान मुलांचे बोर नहाण, पतंग उडवणे, या आनंदकृती असल्या तरी भारतीय कृषीपरंपरेला आणि निसर्गाला मानणार्‍या आहेत…आनंदाचे संकेत आहेत.”

खरोखरच आज मला मी, तिळगुळ आणि संक्रांत यातील परस्परसंबंध डोळसपणे जाणता आले…

चला तर मग—–

तिळगुळ घ्या अन् गोड बोला…

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘व्हीलचेअर…’ – लेखक – अज्ञात  ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘व्हीलचेअर…’ – लेखक – अज्ञात  ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

विवियाना मॉलमध्ये रविवारी संध्याकाळची वेळ म्हणजे तरुणांची गर्दीची वेळ.. त्यांचा चिवचिवाट, भरलेले कॉफी हाऊसेस, सेल्फी टाईम.

अशा गर्दीच्या वातावरणात चटकन नजर गेली ती एका व्हीलचेअरवर एका आजीबाईंना प्रेमाने नेणारा एक माणूस आणि सोबत 12-13 वर्षाचा एक मुलगा.. मी आणि माझी मैत्रीण तिथे एका बाजूला बाकावर बसलो होतो. आम्ही बघत होतो.. व्हीलचेअर ढकलत तो माणूस त्या आजीबाईंना इकडून तिकडे नेत होता आणि त्याचा मुलगाही त्याच्या सोबत होता….  ५ मिनिटांतच तो माणूस त्या आजींची व्हीलचेअर आमच्या अगदी बाजूला आणून उभं करून त्या मुलाशी इंग्रजीत बोलत होता. ” मी ATM मधून पैसे काढून एकदोन कामे करून येतो, तू आजी जवळ थांब. ” असं सांगून निघून गेला.

त्या आजी आमच्याकडे बघून थोडं हसल्या.. दोन – तीन मिनिटं गेली आणि हिंदीत मला सांगू लागल्या.. ” हा माझा नातू. मुलाचा मुलगा. आणि तो गेला ना पैसे काढायला तो माझा मुलगा.. आम्ही ठाण्यातच राहतो.. आज ‘सुईधागा’ सिनेमा बघायला आम्ही आलो. सुनेला तिच्या कॉलेज ग्रुपबरोबर बाहेर जायचं होतं, मग माझ्या मुलांनी आमचा हा बेत जुळवून आणला..” नकळत माझ्या तोंडून “अरे वाह!”  निघून गेलं..

आजी पुढे सांगू लागल्या… “ माझं वय 73 आहे.. मला चालता येत नाही म्हणून ही खुर्ची आणि ही फोल्डिंग काठी.. सिनेमा, नाटक बघायला जायचं तर थिएटरमध्ये काळोख व्हायच्या आत आम्हाला आत शिरावं लागतं. म्हणून मी कुठे जायचं म्हणजे माझी वरातच असते.. पण मुलगा, सून ऐकत नाहीत.. अजून दोन मुलं आहेत मला.. पण ते मला सांभाळायला तयार नाहीत.. हा मुलगा सायकॉलॉजीचा प्राध्यापक आहे. तो मला आनंदाने सांभाळतो.. दुसरी भावंडे सांभाळत नाहीत, त्याबद्दल त्याचा आकस नाही. मला माझा मुलगा थिएटरमध्ये काळोख व्हायच्या आतच घेऊन येतो.

आज आम्ही बाहेर जेवून सिनेमाला गेलो.. आता मॉलमध्ये या खुर्चीतून मला फिरवतो.. मी नको म्हणत असताना त्याचं म्हणणं.. ‘बघ नं जग किती बदललंय. सुंदर गोष्टीही आहेतच. असं फिरलीस, चार माणसं बघितलीस की तुझं मन व शरीर ही फ्रेश होईल. मी मनाचा अभ्यास केलेला माणूस आहे म्हणूनच सांगतोय.'”

हे सांगत असताना त्यांचा मुलगा काम आटपून परत आला.. आजीबाई माझ्याशी बोलत असलेल्या बघून त्यांनी त्यांना हिंदीत मला निर्देश करून विचारलं, ” कौन है? किससे बात कर रही हो मम्मा..?”

आजीबाईंनी लगेच सांगितलं, ” यहीपे बैठी थी। ऐसे ही मैने बात की उससे।”

मला वाटलं, हा माणूस वैतागेल. कोण कुठली ही बाई ! पण त्यांनी चक्क हसून मला जे सांगितलं त्यावर मी थक्क झाले.

ते म्हणाले, “आम्ही आईला दर महिन्याला एकदा असं बाहेर फिरवून आणतो.. रोज आम्ही व्यस्त असतो. मग एक दिवस तिला असं बाहेर घेऊन येतो. माझे वडील असतांनाही आम्ही हेच करायचो. ते नाहीत आता.. आज माझी बायको नाही येऊ शकली, नाहीतर आम्ही तिघे येतो. एक दिवस तिला देतो. कधी सिनेमा, नाटक, ते नाही जमलं तर संध्याकाळी तरी काहीतरी प्लॅन करतो आणि तिला फ्रेश व्हायला मदत करतो. त्यामुळे तिची तब्येत चांगली राहायला मदतच होते ना.”

आम्हाला त्यांनी धन्यवाद म्हटलं, ” माझ्या आईला तुमची सोबतच झाली ” म्हणून ते तिघेही निघून गेले नि मी आणि माझी मैत्रीण सुन्न झालो. अरे किती नशीबवान या आजी..

 — कुठे ही परिस्थिती नी कुठे ‘आईवडील नकोत’ ही भावना जोपासणारी काही मुलं आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात..  समाजात एकाच परिस्थितीबाबत दोन भिन्न बाजू दिसल्या.

वय झालं आहे.. चालता येत नाही.. गर्दीत कुठे न्यायचं.. असा विचार न करता हा आजींचा मुलगा, सून आणि नातू ही यांच्या लेखी ‘आई म्हातारी झाली पण मी नेईन, तिला आनंद मिळावा’ ही भावना..

अशीही माणसं समाजात आहेत हे बघून आम्हा दोघींना खरंच खूप बरं वाटलं. आणि कितीतरी वेळ आम्ही शांतपणे त्या तिघांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे शांतपणे बघत होतो आणि डोळे कधी पाणावले कळलंच नाही…

लेखका : अज्ञात. 

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कृष्णा तुझ्यासवे एक सांजरात दे – लेखिका – सौ. मानिनी महाजन ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ कृष्णा तुझ्यासवे एक सांजरात दे – लेखिका – सौ.मानिनी महाजन ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

कृष्णा तुझ्यासवे एक सांजरात दे ..  प्रीतीची मला एक साद दे 

धावत येऊन गळामिठी दे ..  तुझ्या पाव्याच्या मंजुळ स्वरात भिजू दे

तुझ्या प्रेमात राधेसम आकंठ बुडू दे ..  मीरा होऊन तुझ्यात सामावू दे 

कृष्णा तुझ्यासवे एक सांजरात दे…… 

 

विसरून जगाला तुझीच होऊ दे .. चंद्राचा झुला अन् चांदण्यांचे लक्ष लक्ष दिवे होऊ दे 

मन नौकेत विराजमान होऊन ..  प्रीतीची गाज ऐकू दे….

कृष्णा तुझ्यासवे एक सांजरात दे…..

 

कृष्णा बस फक्त तू आणि मी .. भैरवीचे सूर गाता-गाता भूपातुन तुला आळवू दे 

प्रीतीच्या पायघड्यावरून चालताना .. तू माझ्यात नि मी तुझ्यात सामावू दे

कृष्णा तुझ्यासवे एक सांजरात दे …..

 

प्रेम एवढं अवघड नसतं .. हे जगाला कळू दे….

निर्मळ प्रेमाला विश्वासाची झालर दे .. प्रीतीचे पंख दे.. उडण्याचे बळ दे 

श्वास श्वास रंध्र रंध्र कृष्णमय होऊ दे 

कृष्णा तुझ्यासवे एक सांजरात दे…….

 

लेखिका — सौ.मानिनी महाजन, मुंबई 

संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ किंमत अन्नाची … सुश्री नीला  महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

??

☆ किंमत अन्नाची … सुश्री नीला  महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

यू  ट्युबला एका आहारतज्ञाचं भाषण ऐकण्यात आलं. त्यात त्यांनी योग्य आहार,सप्लिमेंट्स यांद्वारे  अनेक रुग्णांना विविध आजारांतून कसं बरं केलं ,ते प्रभावीरीत्या सांगितलं होतं..

काही महिन्यांपूर्वी  निघालेली B12 व D जीवनसत्त्वाची कमतरता व काही तब्येतीच्या तक्रारींमुळे मी  या 

आहारतज्ञांकडे फोन केला.फोन साहजिकच  रिसेप्शनिस्टने घेतला…. ” आमच्या मॅडम ऑन लाईन तुमच्याशी ३० ते ४० मिनिटे बोलून तुम्हाला सल्ला देतील. या सल्ल्याची फी रु. तीन हजार असेल. तुमची केस पाहून तुम्हाला आम्ही तीन महिन्यांसाठी एक डाएट प्लॅन देऊ. तो तुम्हाला फॉलो करावा लागेल.तुम्ही जर हा प्लॅन घेतलात तर 

तीन हजारमधील दोन हजार रुपये आम्ही परत करू.”

दोन हजार रुपये परत करणार म्हटल्यावर मला एकदम भारी वाटलं. डाएट प्लॅन घ्यायचाच ,असा पक्का निश्चय करून मी विचारलं, ” मॅडम, म्हणजे हा डाएट प्लॅन एक हजार रुपयात मला पडेल नं?”

” अहो मॅडम नाही नाही.डाएट प्लॅनची किंमत वेगळी पडणार.”

” किती आहे किंमत”  मी जरा नाराजीनेच विचारले.

” प्रत्येक पेशंटनुसार प्लॅन वेगळा असतो.त्यामुळे किंमतही वेगळी असते.”

” अहो पण रेंज असेल नं,कमीत कमी किंमत काय असेल ?”

“साठ हजार”. …. 

माझ्या हातातून  फोन खाली पडला. दोन दिवसांनी  माझ्या जवळच्या  मैत्रिणीच्या चित्राच्या घरी गेले होते.

तिला ही घटना ऐकवली. क्षणार्धात तिचा चेहरा रागाने लाल झाला. ती आत गेली. हातात अनेक बाटल्या,प्लास्टिकचे डबे आणि फाईल घेऊन बाहेर आली….. आठ महिन्यांपूर्वी चित्राला खूप अशक्तपणा वाटू लागला होता.काम होत नव्हते.चिडचिडेपणा आला होता.जगण्यात अर्थ वाटत नव्हता. ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी तिला तपासले.त्यांना काही विशेष आजार वाटला नाही. जीवनसत्त्व ,लोहासारखी खनिजं यांच्या कमतरतेमुळे असं होऊ शकतं. पौष्टिक, संतुलितआहाराने बरं वाटेल, असं  त्या जुन्या जाणत्या डॉक्टरांचं मत पडलं.

लक्ष्मी पाणी  भरत असलेल्या चित्राच्या घरात अन्नाची काही  कमी नव्हती. स्वयंपाकाच्या मावशी  दोन्ही वेळेला  प्रत्येकाच्या आवडीचं जेवण रांधत होत्या. पण चित्राला दाक्षिणात्य पदार्थ आवडत .ती बरेचदा  वैशाली, वाडेश्वरमधून  इडल्या,डोसेच मागवून खाई. इतर वेळी वरणभातावरच तिचं पोट भरत असे. आईस्क्रीम मात्रं तिला रोज लागायचेच. आणि चहा हे तिचं अमृत होतं. दिवसातून सात-आठदा तरी तिचा चहा होत असे. चित्राच्या लेकीचे चायनीजशिवाय पान हलत नसे. ती मैत्रिणींबरोबर चायनीज खाऊनच घरी येत असे. शिवाय डॉमिनोज ,पिझा हट, मॅकडी  ही तिची तीर्थस्थानं होती. घरची पोळी भाजी तिला बोअर होई. भात खाणं हे तर तिला पाप वाटे. पिझा,बर्गरनी  तिच्या व्यक्तीमत्त्वाला चांगलच वजनदार  केलं होतं.. मंदार ,चित्राचे यजमान त्यांच्या धंद्याच्या निमित्ताने  बरेचदा बाहेरच असत. सामिष जेवण त्यांचा जीव की प्राण…विविध गावांतील कोणत्या हॉटेलात फिश चांगला मिळतो, कुठे बिर्याणी लाजवाब असते, हे सांगताना  सरस्वती त्यांच्या जीभेवर नाचत असे. मटन,तांबडा-पांढरा खाण्यासाठी ते मित्रांबरोबर खास  कोल्हापुरला जात असत. त्यामुळे  चित्राच्या शाकाहारी घरी जेवणासाठी ते क्वचितच  असत.

चित्रावर त्यांचं खूप प्रेम होतं. म्हणूनच चित्रा आजारी पडल्यावर त्यांनी तिला लगेच डॉक्टरांकडे  नेलं. डॉक्टरांनी जेंव्हा जीवनसत्त्व, खनिजे, लोह यांची कमतरता सांगितली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. एवढ्या समृद्ध भरल्या घरात असं का व्हावं ते त्यांना समजेना. म्हणूनच शेवटी ते शहरातल्या  प्रसिद्ध व महागड्या आहारतज्ञांकडे चित्राला घेऊन गेले.

मी चित्राची फाईल पाहिली. फाईलमध्ये  तिच्या रक्ताच्या तपासण्यांचे रिपोर्ट्स होते. त्यात  अनेक जीवनसत्त्वे, खनिजे,लोह यांची कमतरता तिच्या रक्तात दिसत होती. त्या फाईलवर  मी चौकशी केलेल्या  क्लिनिकचेच नाव दिसत होते. निरनिराळ्या  व्हिटॅमिन्स, मिनरल्सच्या  गोळ्या असलेल्या बाटल्या  दिलेल्या होत्या. प्लॅस्टिकच्या डब्यातून  नाचणी,बाजरी वगैरेंची  कसली कसली पिठे दिसत होती. या सगळ्यांचे तिच्याकडून ऐंशी हजार रुपये घेतले होते.

दिलेल्या प्लॅननुसार  तिने  ही औषधे घेण्यास सुरुवात केली. जेवणाऐवजी  पिठे  शिजवून खाऊ लागली. दोन दिवस बरं वाटलं. तिसऱ्या दिवसापासून  जुलाब होऊ लागले. आहारतज्ञाला फोन केला. प्लॅननुसार सगळं सुरू ठेवा,असं उत्तर मिळालं. दोन  दिवसांनी  जुलाबांबरोबरच उलट्याही सुरू झाल्या. पुन्हा आहारतज्ञाला फोन गेला. मॅडम परदेशी गेल्याचं उत्तर मिळालं.

मैत्रीण उलट्या जुलाबांनी अंथरुणाला खिळली. चित्राच्या यजमानांना काय करावं ते समजेना. त्यांना  ज्या आत्यांनी  लहानाचं मोठं केलं होतं त्या आत्याला गाडी पाठवून गावाकडून  घरी आणलं. आत्यांनी वयाची ऐंशी वर्षं पार केलेली असली तरी पन्नाशीच्या चित्रापेक्षा त्या ठणठणीत दिसत होत्या. ऐंशी पावसाळे पाहिलेल्या आत्याबाईंच्या सारं लक्षात आलं….. त्यांनी आल्या दिवसापासून पदर खोचून स्वयंपाकघराचा ताबा घेतला. त्यांनी  तिच्यासाठी  लोणकढ्या तुपातले  मुगाचे,नाचणीचे, डिंकाचे  लाडू बनवले. चित्राचा चहा बंद करून  टाकला. उठल्याबरोबर कोमट पाणी, लिंबू नि मध तिला प्यायला देत असत. नाष्ट्याला  ताजा बनवलेला लाडू नि गरमागरम  भाताचे प्रकार.. गरम गरम भाताबरोबर कधी मेतकूट तूप लोणचं ,कधी कुळथाचं पिठलं, कधी लसणाची फोडणी दिलेलं मुगाचं वरण, कधी टोमॅटोचं तर कधी आमसुलाचं सार ! कधीतरी  मुगडाळीची खिचडी ,तूप ,पापड नि  मुरलेलं लिंबाचं लोणचं….. 

दुपारच्या जेवणात  गरम गरम पोळी, तूप, कधी  बाजरीची तर कधी नाचणीची भाकरी. तिच्यासोबत घरच्या ताज्या  लोण्याचा गोळा. पोळी-भाकरीसोबत  लिंबू पिळलेली, भरपूर कोथिंबीर घातलेली  रोज वेगळी कोशिंबीर, मोड आलेल्या कडधान्याची उसळ, रोज नवीन फळभाजी नि ओल्या खोबऱ्याची, कच्च्या टोमॅटोची ,कांद्याची, दोडक्याच्या किंवा दुधीच्या सालीची खमंग चटणी….. 

दुपारी  गरम गरम उपमा ,कधी पोह्याचा एखादा प्रकार ,कधी लाह्यापीठ ,कधी थालीपीठ, कधी मिश्र धान्यांचं गरमागरम  धिरडं ….. 

रात्रीच्या जेवणात मात्रं गरम गरम ज्वारीची  भाकरी, पालेभाजी नि जवस, खोबरं, कारळे, लसूण यांपैकी एकाची  चटणी. दिवसभरात  दोन मोसमी फळे  तिला खावीच  लागत..

आता  आत्याबाई  हे  एकटीला थोडच खाऊ घालणार ?

साऱ्या घराचाच हा डाएट प्लॅन झाला. आणि आत्यांना नाही म्हणण्याची किंवा विरोध करण्याची कुणाची बिशाद नव्हती.

चित्राला तिच्या न कळत  कधी  बरं वाटू  लागलं, ते कळलंच नाही. तिचा अशक्तपणा, निरुत्साह , निराशा सगळं सगळं पळालंच, पण चित्राच्या  यजमानांची रक्तातील वाढलेली साखरही पळाली. लेकीचं वाढलेलं वजन पळालं नि तिच्यामागे कॉलेजात  मुले लागू  लागली..

….. आजारपणाच्या  छायेनं वेढलेलं  घर  हसतं-खेळतं  झालं.

बाहेरून पिझा ,बर्गर, वडापाव, तेलकट चायनीज, तुपकट पंजाबी ,बेचव कॉंटिनेंटल मागवणं  बंद झालं नि पैशाची कल्पनेपलिकडे बचत होऊ लागली……. पण यासाठी  ऐंशी हजार रुपये अक्कलखाती  जमा करावे  लागले.

भाच्याच्या घरातील पोटं आणि  तब्येती मार्गी लावून आत्याबाई आपल्या गावी  निघाल्या.. चित्रा नि  तिच्या  यजमानांनी  आत्याला वाकून  नमस्कार केला . आत्याबाईंनी  डोक्यावर ठेवलेल्या आशीर्वादाचा हात हातात घेतला, नि त्या अन्नपूर्णेच्या हातात नवीन घडवून आणलेले  सोन्याचे  बिलवर चित्राने  घातले.

” अरे  पोरांनो, हे  एवढे महाग  जिन्नस  कशासाठी ?” … आत्याबाई  चक्रावून  बोलल्या..

” आत्या  तू  तुझ्या अन्नपूर्णेच्या हातांनी जे पौष्टिक अन्न आम्हाला करून वाढलंस त्यामुळे चित्रालाच काय, आम्हा सर्वांना पुनर्जन्म मिळाला. त्या अन्नाची किंमत होऊच शकत नाही. पण ही फूल ना फुलाची पाकळी. “…..

लेखिका : सुश्री नीला  महाबळ गोडबोले, सोलापूर

संग्राहिका : वीणा छापखाने

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ लेकी … लेखिका- डाॅ.नयनचंद्र सरस्वते ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

??

☆ लेकी … लेखिका- डाॅ.नयनचंद्र सरस्वते ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

ओठांचे कोपरे विलग करत

फुलासारख्या हसत राहतात लेकी

आणि

नाचरी पावले नुसती वाहत राहतात

निर्झराच्या उत्कट आनंदाने…

लेकी रंगीत साड्या नेसतात म्हणे… कानात डूल डुलतात

हातात सुगंधी फुले आणि वाऱ्यावर उडणारे केस

लेकी नाजूक दिसतात…लेकी आकर्षक असतात म्हणे …… 

अरे, याच नाजूक-साजूक लेकी

कठीण कातळाला धडका देत

शोधत राहतात निरंतर जिवंत झरे

हे दिसत नाही कुणाला 

आणि…. 

दिसले तरी, करत नाहीत कधीच मान्य……. 

पांडुरंगा…

आसुसून-आसुसून कुशीत शिरतात लेकी

तेव्हा शब्द बोलतात वेगळे…स्पर्श सांगतो दुसरे काही…… 

तुला सांगू का…

काय मागतात रे लेकी…???

नाचऱ्या पावलांमागील समर्थ कर्तृत्व पहा

हसणाऱ्या चेहऱ्यामागील वेदना न्याहाळा

नाजूक हातांनी दिलेल्या धडका अनुभवा

मान्य करा….”अहं ” सोडून…एकदा मान्य करा…… 

“स्त्री” म्हणून दिसण्यापेक्षा “असणे “…मान्य करा..

काय मागतात रे लेकी…?

आमच्या प्राक्तनातले कातळ आम्ही सांभाळू,

तुम्ही तरी वाटेत उभे राहू नका

नवीन “वांझ कातळ” होऊन….. 

कुशीत शिरलेल्या लेकी…

सांगत राहतात ना मूक राहून

तेव्हा…. जीव जळतो पांडुरंगा… जीव जळतो…

असो….

तू “माऊली” म्हणून बोलले हो…

अन्यथा

माऊलीचे जळणे फक्त तिलाच ठाऊक बाबा…….. 

लेखक : डॉ. नयनचंद्र सरस्वते

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हे ईश्वरा… लेखिका – डाॅ.नीलिमा गुंडी ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ हे ईश्वरा… लेखिका – डाॅ.नीलिमा गुंडी ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

हे ईश्वरा ,

तुझ्या  असण्याविषयीच्या भोव-यात गुंतण्यापूर्वी

नि तुझ्या बासरीच्या सुरांनी मोहित होण्यापूर्वी ….  

विचारायचा आहे  तुला एक प्रश्न ! 

 

पुन्हा पुन्हा अवतार घेताना..  

एकदाही तू स्त्रीचा जन्म कसा नाही  घेतलास ?

तिच्या दुर्दैवाचे दशावतार भोगायला का कचरलास ? 

सोपे होते रे तुझे कुब्जेला सुंदर करणे …. 

…. नि द्रौपदीला वस्त्रे पुरवणे ! 

जगून तरी पाहायचे त्यांचे अपमानित जगणे !

 

मोरपिसाच्या स्पर्शाने बुजतात का क्षणात …. 

…. सा-या जखमांचे व्रण ?

नि शिळा जिवंत होताच सरते का रे …. तिचे अपराधीपण ? 

 

हे सर्वज्ञा , 

जन्माचे रहस्य  तूच जिच्याकडे  सोपवलेस ,

तिच्या मनाचा थांग तुला कसा नाही लागला ? 

लेखिका – डॉ. नीलिमा गुंडी

प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नात्यांची “स्माईलिंग फोडणी!”… अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

? मनमंजुषेतून ?

☆ नात्यांची “स्माईलिंग फोडणी!”… अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

आमटीला फोडणी घातली की कसा चर्र असा आवाज येतो, आणि घरभर घमघमाट सुटतो. तेल, मोहरी, जिरं, हिंग, मेथी, कढीपत्ता, मिरची, हळद यांचा स्वतःचा गंध आणि त्यांच्या एकत्रित झालेल्या सुवासानं सगळ्यांच्या नाकाचा ताबा घेतला जातो!!

 ही अशी स्वैपाकातली फोडणी, मग ती भाजीची असो वा आमटीची, सगळ्यांचीच भूक चाळवते, भुरळ घालते, एकत्र आणते आणि तृप्त करते. 

नाती पण अशीच हवीत ना !! सगळ्यांना जवळ आणणारी, एकत्र ठेवणारी, हवीहवीशी वाटणारी, तृप्त करणारी !!

— फक्त “अंदाज” बरोबर यायला हवा. प्रत्येक घटक अंदाजानेच, पण प्रमाणात पडायला हवा. नाही समजलं?? अहो, समजा फोडणीत मोहरी, जिरंच जास्तं पडलं, तर भाताशी, पोळीशी खाताना किंवा अगदी पिताना, जिरं मोहरी सारखं दाताखाली आलं तर वैतागायलाच होतं, म्हणून ते प्रमाणातच घालायला हवं. नात्यातही तसंच असतं. कुठल्या नात्यात किती इंटरफिअर करायचं (नाक खुपसायचं) हे समजलं की कोणतंच नातं खुपत नाही.

हिंग कितीही औषधी असला तरीही जास्त पडला की तोंड वाकडं करुन डोळे मिटले जातात आणि राग येतो !!! आपणही कधीतरी प्रमाणाबाहेर बोलतो, पद्धत सोडून बोलतो, तीव्र बोलतो आणि मग ते बोलणं कितीही समोरच्याच्या भल्यासाठी असलं तरी, नात्यांमधे वितुष्ट यायला वेळ लागत नाही.

मेथी जराजरी जास्त पडली, तर जेवणात कडवटपणाच येतो. आपणही कधी कधी राग आला की अगदी टाकून बोलतो, टोकाचं बोलतो, इतरांच्या मनाचा विचार करत नाही. मग नात्यात अढी निर्माण होतेच ना!! अगदीच कबुल आहे, आपल्या माणसांना हक्कानं बोलावं…पण प्रमाणात. एक वेळ स्वैपाक कडवट झाला तरी चालेल, पण नाती नको!! 

कढीपत्ता हा सुगंध येईल इतकाच घालावा, नाहीतर जेवण उग्र होतं. माणूस हा कायमच प्रेमात पडत असतो, कधी व्यक्तींच्या, तर कधी वस्तूंच्या !! एकमेकांवर अतोनात प्रेम करणं वेगळं आणि प्रेमात गुदमरायला लावणं वेगळं !! स्वतःला आणि इतरांना झेपेल इतकंच प्रेम करावं, नाहीतर नात्यातला सुगंध हरवून जातो.

हळदीचा रंग मोहक, अगदी प्रमाणात घातली की तिच्या गुणांबरोबर तिचं अस्तित्वही प्रेमात पाडतं. गरज असेल तेव्हा मदत जरुर करावी, पण समोरच्याला “स्पेस” ही द्यावी. आपण आहोत, आपलं अस्तित्त्वं आहे, इतकं जरी समोरच्याला जाणवलं ना, की मग सगळंच सोप्पं होतं.

तेलही आवश्यक इतकंच !! भसाभसा ओतून किंवा अगदी थेंबभर घातलं की फोडणी बिघडलीच म्हणून समजा !!  जास्त तेल पडलं तर मूळ पदार्थापेक्षा तेलाचीच चव जिभेवर रेंगाळेल, आणि कमी पडलं तर ते इतर घटकांना सामावून कसं घेणार?? नात्यात ओशटपणा नको. आपल्यात इतरांना सामावून घेण्याइतका मोठेपणा असावा, पण आपण किती महान आणि किती चांगले हे त्यांना न जाणवता, कसलाच दिखावा न करता !! तरच मनं एकमेकांत सामावली जातील.

आपल्या स्वैपाकात मिरचीचं प्रमाण कसं आणि किती असावं ?  तसंच मुळमुळीत नाती नकोशी होतात अन तिखटपणा, जहालपणा नात्याला सुरुंग लावतो. 

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आच !! फोडणी फक्कड तेव्हाच जमते, जेव्हा भांड्याखालची आच योग्य प्रमाणात असते अन भांडं योग्य प्रमाणात तापतं तेव्हा !! जर आच प्रमाणापेक्षा कमी असेल, तर फोडणी कच्चीच राहील आणि सगळ्या स्वैपाकाची मजाच जाईल. जर आच प्रमाणापेक्षा जास्त असेल तर रागाप्रमाणे त्यातला प्रत्येक घटक तडतडून अंगावर उडेल, इजा होईल, मोहक हळद काळी पडेल आणि फोडणी जळेल. 

—आपल्या नात्यातही आच योग्यच हवी.—-  नाती कच्चीही रहायला नकोत अन जळायलाही नकोत. 

— तरच नात्यांची फोडणी अचूक जमली, असं म्हणता येईल.

लेखक : अज्ञात 

संग्रहिका – सुश्री माधुरी परांजपे

बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

मो ९४२११२५३५७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆घरापासून … ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे   

? मनमंजुषेतून ?

☆ घरापासून… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

अत्यंत बेताच्या परिस्थितीतून शिक्षण घेतलेले दोघे. उच्च विद्या विभूषित. पदवी घेतल्यानंतर लग्न करतात.. स्वतःवर विश्वास असलेले शून्यातून विश्व निर्माण करायला निघतात. तो पैसे मिळविण्याकरिता करिअर करण्यात रममाण होतो. खूप स्वप्नं उराशी बाळगलेली ती संसारात मुलाबाळांच्यात पूर्ण विरून जाते. कायम सहकाऱ्याच्या रुपात आपली भूमिका बजावत राहते. तिला आवाज असतो पण बोलून उपयोग नसतो. अजून काही दिवस म्हणून शांत राहते.. प्रतिष्ठेला भुकेलेला आणि स्वतःला सगळं समजतंय या अविर्भावात असलेला तिचा जोडीदार, तिच्या मनाचा, करिअरचा विचार करत नसतो. ” तू हवं ते करु शकतेस !” असं म्हणायचं पण घरातली कोणतीही जबाबदारी उचलायची नाही. आपलं काम आणि समाजकार्याचं भूत डोक्यात घेऊन कोणत्या ना कोणत्या कामात गुंतून पडायचं. तिची केविलवाणी धडपड चालू राहते. सगळंच अंगावर पडल्यामुळे तिला काही सुचत नसतं. तिची खूप चिडचिड आणि स्वतःचा त्रागा होत राहतो.

एखाद्या गोष्टीला विरोध केला की, वाद-विवाद भांडण, अंगावर येणं, हात उगारणं ठरलेलं. स्वतःचे आई वडील, भाऊ बहीण यांच्यात रममाण. ” माझेच दोन रुपये घ्या पण मला साहेब म्हणा !” अशी त्याची अवस्था. 

दोन मुलं, त्यांची शाळा, मुलांवरील संस्कार, स्वयंपाक, घरकामाचे नियोजन  सगळं तिनचं पाहायचं..! मुलं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात छान प्रगती करतात.. त्यावेळी माझी मुलं म्हणून ओरडून ओरडून सगळ्यांना सांगायला हा पुढे पुढे पळायचा. मुलांना हे नको ते नको म्हणून आडवं पडायचे. त्यांच्याशी भांडणाच्या स्वरात बोलायचे. त्यांच्या वयाचे होऊन त्यांना समजून घ्यायचे नाही. स्वतःचे महत्त्व कायम अधोरेखित करायचे. सगळं श्रेय स्वतःला कसं घ्यायचे याची कला वाखाणण्याजोगी.

एक दिवस हा माणूस आपल्या बायकोला म्हणतो. ” आपली मुलं चांगली घडली. आपण आदर्श पालक आहोत. आपण घरात समतेने, लोकशाहीने वागलो. याचा मुलांवर चांगला परिणाम झाला..!” ती मागचं सगळं आठवते आणि म्हणते, “दहा मिनिट शांत बसून विचार कर ! लोकशाही, समता कशाला म्हणतात याचा अभ्यास कर ! मग बोलू आपण…. “

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9767812692/9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रे मना… आज कोणी बघ तुला साद घाली… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

??

☆ रे मना… आज कोणी बघ तुला साद घाली… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

मन ! संस्कृत आणि प्राकृतातही एकच शब्द, काय आहे हो याची व्याख्या ?

“The heart is situated at the left side in the human body“–असं हृदयाबद्दल खात्रीशीर सांगितलं जातं मग मनाचं काय? कुठे असते ते वसलेलं ? हृदयात? हृदयाच्या पाठीमागे ? शरीराच्या उजव्या बाजूस ? मेंदूत ? नेमके कुठे? काहीच सांगता येत नाही ना? 

बहिणाबाईंच्या शब्दात सांगायचे झाले तर ‘आता होतं भुईवर, गेलं गेलं आभायात’. असंच काहीसं मनाचं स्थान आहे. शरीरात कधीच स्थिर नसणारे मन, ठावठिकाणा नसणारे मन, आपल्या शरीरावर ,जीवनावर मात्र प्रभावशाली अंमल करते. हृदयाची जागा खात्रीशीर असून देखील ते कधीकधी कमजोर असते ,नव्हे ते कमजोर असले तरी चालते कदाचित ! त्यावर उपचार करता येतात.. पण मन कमजोर असेल तर? तर मात्र माणूस पूर्ण दुबळा होतो. त्याची जगण्याची दिशा बदलते, त्याची आकांक्षा ,उमेद सर्वच नष्ट होते.

A sound mind in a sound body असं म्हटलं आहे ते उगाच नव्हे ! ‘ मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण ‘!! असं तुकारामांनी म्हटलंय; कारण माणसाचे मन शुद्ध असेल तर त्यात सर्व भाव शुद्ध येतात, अन कर्मेही शुद्धच होतात.स्वच्छ पाण्यात सभोवतालचा परिसर स्वच्छच  दिसतो. तसेच मनाचे देखील आहे.  मनापासून केलेले कोणतेही काम मनाला आनंद ,उत्साह ,उभारी देते अन मन प्रसन्न करते. आणि त्यावरच त्या कामाची यशस्वीता देखील अवलंबून असते . वरवर केलेले काम भलेही चांगले दिसले तरी स्वतःस समाधान देत नाही . मन लावून केलेली देवपूजा मन शांत करते ,चित्त प्रसन्न करते. मन लावून धुतलेले कपडे ,घासलेली भांडी कशी स्वच्छ ,चकचकीत होतात ! मन लावून केलेला स्वयंपाक रुचकर होतो अन भूक तृप्त करतो .मनापासून केलेला अभ्यास ज्ञान वाढवतो.  मनापासून गायलेलं गाणं हृदयास भिडते ,असे सर्व काही मनाच्या ओलसर भूमीतून अंकुरते .

  एवढ्याश्या मनाची व्याप्ती मात्र खूप मोठी असते. शक्ती तर कितीतरी पट मोठी असते. म्हणून पंगूसुद्धा हिमशिखरे ओलांडतात, नावेशिवाय नदीचा तीर गाठतात. ‘ मन कधी कधी इतके छोटे होते की चिमटीहून लहान जागेत मावते अन कधी इतके मोठे  होते की त्यात सारे अवकाश सुद्धा समावते ‘….. 

‘मन एवढं एवढं जणू खाकशीचा दाणा 

 मन केवढं केवढं त्यात आभाय मायेना !’

मनोव्यापारावर मानवी देह व जीवन अवलंबून आहे. कधी ते आकाशात स्वैर भरारी मारते तर कधी फांदीवर बसून हिंदोळते. कधी चांदणे बनते तर कधी गच्च काळोख ! कधी भिरभिरते तर कधी स्थिर बसते ! अगदी निमिषार्धात ते जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाते.आपल्या प्रिय व्यक्तीपाशी पोचते. त्याच्याशी हितगुज करते, कधी रुसते तर कधी हसते, कधी खट्टू होते तर कधी लट्टू !

या जगात सर्वात वेगवान काय असेल तर ते मन ! एवढे मात्र खरे की, मन उत्साही असेल तर जीवन उत्साही प्रवाही राहते. मनाला कीड लागली , आजार लागला तर देह कितीही सशक्त असला तरी कमजोर बनतो, आजारी पडतो .

मन तरुण असेल तर ते म्हातारपणही टवटवीत बनवते, आणि मन म्हातारे असेल तर तारुण्यातही म्हातारपण येते. म्हणूनच मनाला हवे जपायला फुलासारखे ! मग बघा या फुलाभोवती किती रंगीबेरंगी आनंदाची फुलपाखरे रुंजी घालतात अन जीवन मधाळ फुलपाखरी होते !…. फुलपाखरू खरेच  छान किती  दिसते !!

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares