मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “खुश रहे तू सदा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “खुश रहे तू सदा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… आज अचानक सुमीची गाठ पडली. काॅलेज रोड वरून चालत निघालेली… सोबत तिचा कुंकवाचा टिळा नामक टिक्कोजी राव होता तिच्या संरक्षणाची ढाल बनून असल्यासारखा… दोन वर्षापूर्वी सुमी नि मी एकाच आर्टस काॅलेजातले, मराठी विषय एम. ए. च्या वर्गातले… हाताच्या बोटावर मोजता येणारी वर्गातली ती एकूणच पटसंख्या असलेला तो वर्ग त्यात आम्ही मुलं जेमतेम दोन तीन आणि मुलींचाच भरणा जास्त… अर्थात आम्हा मुलांना चाॅईस भरपूर होता… आमचे मुलांचे आप आपल्या परीने गनिमी काव्याने किल्ले लढवणे सुरू होतेच.. शेवटचे सत्र संपायच्या आत बात पक्की करने के आरमान काफ़ी बुलंद थे.. पण आमच्या तिघां पैकी एकच लकी बाॅय ठरला आणि आम्ही रडवैय्या भारतभूषण चे वारसदार झालो.. प्रियाराधन मनापासून करूनही सुमीने मला नाक मुरडले… आता दैवजात मिळालेली काटकुळी, गहूवर्णीय शरीरसंपदा नि बावळट चेहरा याने माझ्या भावी सुख स्वप्नांचा चुराडा केला होता… एकटी सुमीच काय पण तिच्या अवतीभवती असणाऱ्या साळकाया माळकाया, स्वतःला सो कॉल्ड रुप सुंदरीचं आभासी नि अहंकारी कवचाचे लेपन केलंल असल्याने त्यांनी देखील मला डावललं.. मलाही त्यांच्यात काडीचाही इंटरेस्ट नव्हताच म्हणा… पण सुमी नाहीच म्हणाली तर तिच्या नाकावर टिच्चून तीचीच मैत्रीण गटवली तर बरी हा सर्व सामान्य विचार मनात केला.. पण तिथेही माशी शिंकलीच… या अक्करमाशी माझ्याच नशीबाला होत्या… तर एकूणातच काय गळाला एकही मासोळी त्यावेळी लागली नाही ती नाहीच… पण मला फक्त सुमीचं त्यातल्या त्यात बरी वाटायची, आवडली होती.. एक कदम तुम भी चलो एक कदम हम भी चलो या बोधवचनाच्या आधारे मीच पुढाकार घेण्याचे ठरवले… तो दिवस मी या आयुष्यात कधीच विसरणार नाही… त्या काळ्यादिवशी सगळे निचीचे ग्रह, व्यतिपात, आणि अनिष्ट फल देणारा माझ्या भाग्यात न भुतो न भविष्यती आला असल्याने.. माझ्या पहिल्या प्रेम व्यक्त करण्याच्या प्रयत्नाला सुमीने अणूबाॅम्म लावून उध्वस्त करून टाकला.. मला चक्क ‘ एकदा आरशात स्वताचं थोबाड बघून ये ‘ असं ती म्हणाली.. ‘आणि पुन्हा जर मागे लागलास तर हेच तुझं थोबाड असं रंगवीन कि कायमची सुमीची आठवण राहील तुझ्या आयुष्यात.. ‘ माझा कोणी कडलोट करेल किंवा हत्तीच्या पायी देईल, फासावर लटकवेल, चालत्या वाहनाखाली,.. निदान बाजारात मिळाणारी जहरची बाटलीने वा या सगळ्या प्रयत्नांपैकी कशाची एकाने मदत केली असती तर बरं झालं असतं.. हा सुमीच्या जीवनातील काटा आपोआप दूर करायला हातभार लागला असता.. या विचारचक्रात माझा कालपव्यय मात्र झाला पण अमंलबजावणी झालीच नाही… सुमीला हत्येचं पाप लागलं नाही… सुमी पुण्यवान, नशीबवान असल्यामुळे लवकरच तिचं पाणीग्रहण कोणी गबाळग्रंथी आयुर्वेदाचार्यशी झालेलं मला उडत उडत समजले… अर्थात मला काही तिने लग्नाला येण्याचं निमंत्रणही हेतूपुरस्सर टाळले होतेच… पण अश्या बातम्या कुठे लपून राहतात.. माझ्या मित्रांची चांडाळचौकडीने तर या संधीचा फायदा साधून माझ्या घायाळ हृदयाची दुखरी जखम जास्त चिघळत ठेवायला आपल्या मैत्रीला जागले… दोस्त दोस्त न रहे प्यार, प्यार न रहा… सुमीच्या त्या साळकाया माळकाया मैत्रीणी पण हुळहुळणाऱ्या जखमेवर मीठ चोळायचा आसुरी आनंदच घेत राहिल्या… आणि मी माझ्या दुभंगलेल्या मनाची नि टुटा फुटा दिल की तू नही तो और सही या समजूतीची मलमपट्टी करत राहीलो… आणि ती और सही च्या शोधात फिरत असताना अचानक सुमी नि तिचा नवरा माझ्या समोरच आलेले दिसले… माझी नि सुमीची नजरानजर झाली… तिचे ते पाण्याने तरारले बोलके डोळे… तीच्या मनातली मला अव्हेरून काय पदरात पडले, या पश्चातापाची अबोल भावना प्रकट करून दाखवत असलेले मला दिसले.. तिची ती केविलवाणी चर्या मला खुप काही सांगून गेली. माझ्या मनात आनंदाची लहर उमटून गेली… मला आरश्यात थोबाड पाहायला लावणारीने असा कोणता जगावेगळा झेंडा लावलाय हे त्या तिच्या सोबत असलेल्या ढेरपोट्या, बेढब आणि डोळ्यावर निळा चष्मा लावून सुमी सोबत निघालेला मला दिसत होता.. सुमीशी केलेलं लग्न हि त्याला लागलेली लाॅटरीच होती… मला त्याच्या भाग्याचा हेवा आणि सुमीच्या नशीबाची किव वाटली… काय पाहिलत त्याच्यात तिने कि जे माझ्याकडं नव्हतं… पण अनहोनी कौन टाल सकता है… चिडीया खेत चुग गई थी… मग मीच मोठं मन करून स्वताशीच गुणगुणत राहिलो.. खुश रहे तू सदा.. ये दुवा है मेरी… सुमीचा तो ढेरपोट्या गबाळग्रंथी नवरा सुमीच्या कानात काहीतरी बोलला.. मला ते ऐकू आलं नाही… पण त्याच्या एकूणच चर्चेवरून मी ताडलं कि.. ‘ तो समोरचा लफंगा बघ कसा प्रेमभंग झाल्यासारखा उध्वस्त झालेला दिसतोय आणि रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या बायका मुलींकडे हसत हसत बघतोय… तो तुझ्याकडे ही तसंच बघतोय… जशी काही तू त्याची पहिली प्रेयसीच असावी.. बघ बघ त्याचं ते केविलवाणं हसणं बघ.. ‘

त्याचं तसलं बोलणं ऐकून सुमी चमकली… आणि नरमाईच्या सुरात… ‘ एकदा अपयश आलं म्हणून थांबत का कोणी!… लवकरच लग्न का करू नये. ?’.. असं मला ऐकू जाईल अश्या आवाजात जाता जाता बोलून गेली. समझनेवाले को इशारा काफ़ी है… सुमी पुढे निघून गेली… कुठूनशी यहूदी सिनेमातले गाण्याची लकेर…. ‘. दिलको तेरी हि तमन्ना… दिलको है तुझसेही प्यार…. ‘ माझ्या कानावर आली… आणि मी तसाच तिथे रेंगाळत राहिलो… सुमीच्या ढेरपोट्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर उमटलेले हासू नि सुमीच्या डोळ्यात लपलेले आसू माझ्या मनाला दंश करत राहीले.

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ ‘ताटाळं…’ ☆ श्री अ. ल. देशपांडे ☆

श्री अ. ल. देशपांडे

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ ‘ताटाळं’ ☆ श्री अ. ल. देशपांडे ☆

ताटाळं. सुधारणेच्या नावाखाली हे ताटाळं  जमीनीवर आलं. सिमेंटच्या भिंती उभ्या राहिल्या. भांडी ठेवण्याचे सेल्फ आलेत. गिरमिटाने भिंतीला भोकं पाडण्यात आली. लांब खिळे स्थानापन्न झाले. त्यावर सेल्फ टांगल्या गेलेत. स्टेनलेस स्टीलची चकचकीत भांडी त्यात ओळीने विराजमान झालीत.

ताटाळं अडगळीत गेलं. दुर्लक्षित झालं. त्याची रया गेली. हळूहळू मोडतोड झाली. त्याला योग्य जागा न मिळाल्याने आबाळ झाली.

ते नकोसे झालेच होते. त्याची मोडीची किंमत घरच्यांना खुणाऊ लागली.

एके दिवशी रोजच ऐकू येणारी हाळी (आरोळी) ” है क्या जूना पुराना सामान ? ” जरा जास्तच जोराने कानावर पडली. घरच्यांनी कान टवकारले.

अनेक वर्षं ताटं,पळ्या,चमचे ,डाव पोटात सामावून घेणारं ताटाळं अलगद भंगार वाल्यांच्या पोत्यात विसावलं.

घरातील एकेकाळची  ही नकोशी वाटणारी अडगळ आता आपल्याला समृद्ध अडगळ वाटू लागली आहे.

कालाय तस्मै नमः॥ 

© श्री अ. ल. देशपांडे

अमरावती

मो. 92257 05884

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “संघर्ष…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “संघर्ष – –” ☆ श्री जगदीश काबरे

हा फोटो एका टोमॅटोच्या झाडाचा आहे. कदाचित एखाद्या प्रवासी यात्रेकरूने टोमॅटोचे बी धावत्या रेल्वेतून फेकली असेल. हे झाड मातीशिवाय, काळ्या पाषाणात रुजले आणि वाढले. लहान असताना शताब्दी किंवा राजधानी एक्सप्रेससारख्या जलद गाड्या याच्या अगदी जवळून जात असतील, कर्कश आवाज याला हादरवत असतील. अस्तित्व संपण्याची भिती होती, पण झाडाने संघर्ष करत स्वतःला जिवंत ठेवले.

ना पाणी, ना खत, ना माती, ना संगोपन… असल्या प्रतिकूल परिस्थितीतही या झाडाने फळ धरले. त्याचा उद्देश एकच होता, वंश सातत्य टिकवणे. या संघर्षात झाडाने तो उद्देश पूर्ण केला.

समाजात बऱ्याच जणांना वाटते की, आपण अपयशी ठरलो, आपले जीवन निरर्थक झाले. परंतु त्यांनी या टोमॅटोच्या झाडापासून शिकायला हवे. परिस्थिती कितीही कठीण असो, संघर्ष करत राहणे आणि ध्येय गाठणे हेच जीवनाचे खरे यश आहे.

म्हणून साथींनो, परिस्थिती प्रतिकूल असली तरी निराश होऊ नका, संघर्ष करा. कारण यश तुमचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तुमची वाट पाहत आहे. जिद्द, चिकाटी आणि विश्वास, हाच असतो माणसाचा यशाकडे जाण्याचा प्रवास. 

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “काटे नसलेला गुलाब…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “काटे नसलेला गुलाब…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

…आम्ही भाजी मंडईतून घरी निघालो होतो… अर्थात आम्ही म्हणजे आम्ही दोघं नवरा बायको… गद्दे पंचवीशीचा माझा बहर लग्नाच्या दशकपूर्ती दरम्यान केव्हाच उतरलेला… आणि हिचा गरगरीत बहरलेला… तिच्या हाताला पैश्याने भरलेल्या पाकिटाचाच भार तेव्हढाच सहन व्हायचा आणि माझा  पैश्याचं पाकिट सोडून बाकी सगळ्याचा भारच उचलून उचलून हर्क्युलस झालेला…त्या भाजीने भरलेल्या दोन जड पिशव्यांचे बंदानीं  माझ्या हाताला घातलेले आढेवेढे …तर  माणसानं सुटसुटीत कसं जगावं याचाच आर्दश जगापुढे ठेवायला हिचं पाऊल नेहमीच पुढे पुढे…. आणि हो भाजीवरुन आठवलं अहो त्या भाजी बाजारात मला ये पडवळ्या नि हिला ढब्बू मिरची या नावानेच  ओळखतात.. अहो त्यांना मी सतत डोळे मिचकावून ‘ असं निदान आमच्या समोर तरी म्हणून नका ‘ असं ज्याला त्याला डोळ्यांच्या सांकेतिक भाषेत सांगू पाहत राही.. पण  ते टोमणे ऐकून ज्याला त्याला  हि मात्र रागाने डोळे वटारून बघत असते.. आणि चुकून माकून त्याचवेळी मी करत असलेल्या नेत्रपल्लवीकडे  तिचे लक्ष गेलेच तर डोळे फाडून फाडून बघते हा काय पांचटपणा चालवलाय तुम्ही असे कायिक आर्विभाव करते… आता एकदा हिच्या बरोबर लग्न करून पस्तावा पावल्यावर लग्न या गोष्टीवरचा माझा विश्वासच उडाला असताना आणि इथून तिथून बायकांची जात शेवटी एकच असते तेव्हा खाली मान घालून चालणं ठरवल्यावर पुन्हा मान वर करून दुसऱ्या स्त्री कडे बघण्याचा सोस तरी उरेल का तुम्हीच सांगा! तरी पुरूष जातीचा स्वयंभू चंचलपणा कधीतरी डोकं वर काढतोच… आणि तशी एखादी हिरवळ नजरेला पडलीच तर माझा मीच अचंबित होतो…  अहो तुम्हाला म्हणून सांगतो आमच्या त्या घराच्या वाटेवर एक सुंदरशी बाग आहे… रोज संध्याकाळी तिथं प्रेमी युगुलांचा नि कुटुंब वत्सलांचा जथ्था जागोजागी प्रेमाचे आलाप आळवताना दिसतात ना डोळ्यांना.. अगदी सहजपणे… कितीतरी मान वळवून दुसऱ्या दिशेला पाहायचा प्रयत्न केला तरी… मनचक्ष्चू तेच तेच चित्र दाखवत राहतात… मग वाटायचं आपलं मनं शुद्ध भावनेचं आहे यावर आपला विश्वास असताना कशाला उगाच दिसणाऱ्या सृष्टीला दृष्टिआड जबरदस्तीने करा… प्रत्येकाची आपापली तर्हा असते आपलं प्रेम व्यक्त करण्याची… करू देत कि बिचारे… आपल्याला हे सुख मिळालं नाही याची खंत  करण्यापेक्षा ते प्रेमी युगुल किती नशीबवान आहे.. कि त्यांच्या वाट्याला काटे नसलेला गुलाब आला… आणि आपल्याला गुलाब तर कधीच कोमेजून, सुकून गळून गेला आणि हाती फक्त काटेच काटे असणारा देठ मिळाला… असा मी काहीसा मनातल्या मनात विचार करत तिथून चाललो असताना मधेच हिने माझ्याकडे तिरप्या नजरेने पाहिले आणि ती सुद्धा मनात विचार करू लागली… काय पाहतायेत कोण जाणे आणि कसल्या विचारात पडलेत काही कळत नाही.. इथं कशी जोडप्यानं बसलेले प्रेम करतात ते बघून घ्या म्हणावं.. अगदी तसच नसलं तरी बायकोवर कसं प्रेम करावं ते बघून तरी माणसानं शिकायला करायला काय हरकत आहे म्हणते मी… आणि मी एव्हढी घरात असताना जाता येता दुसऱ्यांच्या बायकांकडे बघणं शोभतं का या वयाला…

बराच वेळ मी माझ्या तंद्रीत होतो हे पाहून हिने माझी भावसमाधी कोपराची ढूशी देऊन भंग केली आणि वरच्या पट्टीत आवाज चढवून म्हणाली…  “बघा बघा तो नवरा आपल्या बायकोवर  मनापासून  कसं प्रेम करतोय आणि ती देखील छान प्रतिसाद देतेय… तुम्हाला कधी माझ्याबाबतीत असं जमलयं काय?… नेहमीचं एरंडाचं झाड असल्यासारखं तुमचं वागणं… “

माझ्यातल्या पुरूषार्थाला तिने चुनौतीच दिली…मग मीही ती संधी  साधली तिला म्हटले ” तुला जे दिसते ते कुठल्याही बाजूनें  खरं नाहीच मुळी… एकतरं  ते खरे नवरा बायको नसावेत, आणि  दुसरे  त्यांचे दोघांचे आपापले जोडीदार कुणी वेगळेही असू शकतात…प्रियकर प्रेयसीचं युगुल प्रेम करत आहेत तेच उद्या त्यांचं लग्न झाल्यावर आपल्या जागेवर ते नक्कीच दिसतील… भ्रभाचा भोपळा फुटायाचाच काय तो अवकाश… आणि शेवटचं लांबून कोणीतरी त्यांच्या या लवसिनचं शुटींग करत असणार.. कि या सिनसाठी त्यांनी पैसे घेतले असणार… हे विकतचं दिखाऊ बेगडी प्रेम पडद्यावर दाखवतात त्यावर तू भाळून जाऊ नकोस.. आणि तुला जर मी अगदी असच   तुझ्यावर प्रेम करावसं वाटत असेल तर मला थोडी तुझ्यापासून सुटका कर बाहेर प्रेमाचे धडे गिरवायला मला नवी प्रेयसीचा शोध घेतो  ते धडे शिकल्यावर मग तुझ्यावर प्रेमच प्रेम करत राहिन… “

माझं म्हणणं तिच्या पचनी पडणारं नव्हतचं मुळी.. तिने इतक्या झटक्याने मला म्हणाली “काही नको बाहेर वगैरे जायला तुम्ही जितकं प्रेम सध्या दाखवताय ना तितकसचं पुरेसे आहे मला… घरी तरी चला मग बघते तुमच्या कडे…म्हणे मला नव्याने प्रेयसी शोधायला हवी.. “

आमचा सुखसंवाद चालत असताना माझ्या मनाला सारखी ‘काटे नसलेला गुलाब मात्र दुसऱ्यांना मिळतो आणि मला मात्र गुलाब हरवलेला टोकदार काट्याचा देठच हाती यावा..’ हि सल सतत बोचत राहिली…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “हेल मेट…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “हेल मेट…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

.. “. आता समोरून त्या बाईक वर बसून गेलेली आमच्या मंदी सारखी वाटली!.. ती बाईक चालवणाऱ्याने जरा जास्तच स्पीड मधे माझ्या समोरून नेली ना!.. तिनं मला बघून तिकडं तोंडच फिरवलं!… थोडसा ओझरता चेहरा दिसला दोघांचा… कोण असावा बरं तो? दोघांनी डोक्याला हेल्मेट घातलं असल्याने नीट ओळखता आलं नाही… ती माझी मंदी होती का ? का आणि कुणी दुसरीच होती?… छे! छे! माझी मंदी असं छचोर वागणार नाहीच मुळी!… हं आता आठवलं त्या कर्णिकची शर्मिलाच असणार!… मला बऱ्याच वेळेला दिसलीय ना ती कुणा मित्रांच्या बरोबर हिंडताना… तिचं लक्ष नसायचं इतका मी तिच्या जवळून कितीतरी वेळा गेलोय… पण आपल्याला काय करायचं त्याबाबत… त्या कर्णिक जवळ काही बोलायची सोय नाहीच म्हणा… त्यांना तिचं हे असलं वागणं ठाऊकही असेल, कदाचित त्यांची संमती असेल तिला असं उंडगेपणा करायला… बाकी सोसायटीत उलटसुलट चर्चा काय कमी चालतात?… लोकांची कुठे तोंड बंद करता येतात का?… का म्हणून या पोरटीने आपला सुखाचा जीव धोक्यात टाकावा… चांगल्या कुटूंबातील मुलाशी लग्न करून कसा सुखाचा संसार करायचा सोडून… हेल मेट ची का अवदसा आठवतेय कुणास ठाऊक?… नशीब माझं मंदीवर चांगले संस्कार केले असल्याने आमच्या डोक्याला असला ताप नाही… आता घरी जाऊन आमच्या हिला हे सांगायला हवं.. या आर. टी. ओ. च्या आपली सुरक्षा आपल्या हाती या अभियानाचा हेल्मेट वापराचा सक्तीचा कायदा लागू केला त्यामुळे आपल्याला आपल्याच माणसांची ओळखच पटत नाही… आता हेच बघाना त्या मुलीने पण आमच्या मंदी सारखाच ड्रेस घातलाय कि.. मग मंदी तर नसेल… छे छे डोक्याचा पार भुगाच होऊन राहिलाय… “

“अगं मंदे काय तुझा बाप गं!… त्याच्या समोरून निघून पुढे आलो तर डोक्यात शंकेचं वारूळातला भुगा ऊकरत बसलाय… बघितलसं आपण दोघांनी हेल्मेट घातल्यामुळे तो कनफ्युज कसा झालाय… आज जर आपण हेल्मेट घातलं नसतं, तर आपल्या दोघांची चेकमेटच त्यांने केली असती.. लग्न गाठी स्वर्गात ठरतात ना त्याच्या ऐवजी. मग आपली हेल मेट नक्कीच ठरली असती.. “

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “चल उड़ जा रे पंछी… समय हुआ बेगाना…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “चल उड़ जा रे पंछी… समय हुआ बेगाना…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

हीच आता आपल्या आयुष्याची दोरी आहे बरं… पहाटेचं तांबडं फुटल्या पासून अखंड दिवसभर पंख पसरून निळ्याशार आकाशात गगन विहार करत राहता येईल.. पण संध्याकाळी तांबुस किरमीजी किरणांचा सडा सांडल्यावर आपल्या सगळ्यांना या दोरीवरच रात्रीचा आसरा घेण्यासाठी हीच एकमेव आता जागा शिल्लक राहिली आहे… थोड्या दाटीवाटीने राहायला लागणार आहे ,पण त्याला इलाज नाही… आता पूर्वीसारखं सुटसुटीत स्वतंत्र घरट्यात राहायची लागलेल्या सवयीला बदलावं लागणार आहे.. कारण आता काळ फारच झपाट्याने बदलत चाललाय बरं.. शहरातील वनराई ची हिरवीगार जंगल भुईसपाट करून तिथं आता सिमेंटच्या टोलेजंग जंगलांची व्याप्ती वाढत चालली असल्याने आपली म्हणणारी झाडांची कत्तल करण्यात आली… ती माणसांची जमात आपली घरं बांधताना आपल्याला बेघर करून राहिली… त्यामुळे आपण आता आपलं छप्परच काय पण दुपारच्या कडक उन्हात झाडाच्या सावलीला सुध्दा मुकलोय.. पोट भरण्यासाठी चारापाणी दाण्यासाठी शहरभर उंच उंच उडत जातोय… पण अन्नाचा कण फारच क्वचित ठिकाणी दिसून येतो… आणि जिथे तो दिसतो तिथं तर आपल्याच जातभाईंची झुंबड उडून गेलेली बघावी लागते… कुणाचं एकाचं तरी अश्याने पोटभरत असेल कि नाही.. काही कळत नाही.. जिथं मोठ्यांची ही कथा तिथं कच्चीबच्ची पिलांना कोण आणि कसं पोसणारं… काळ फारच वाईट आलाय… आपल्या जगण्यावर गदा आलीय.. भुकबळी, तहानबळी आणि दिवसरात्र उन्हाळा पावसाळा नि हिवाळा असं उघड्यावर राहणं आपलं जगणचं संपवून टाकायला लागला.. आपली संख्या रोडावत चाललीय.. आता तो दिवस दूर नसेल इतिहासात नोंद असेल या धरेवर पक्षी गणांचं कोणेऐकेकाळी वास्तव्य होतं… बस्स इतकाच दाखला शिल्लक राहील.. तेव्हा आता आपण जितके आहोत तितके एकत्र राहणे हेच श्रेयस्कर राहील… या दोरीवरच सध्या आपला कठीण काळ कंठावा लागेल… त्या माणूस नावाचा स्वार्थी प्राण्याने स्वताची जमात वाढवत वाढवत गेला नि या वसंधुरेचा, निर्सगाचा र्हास करत सुटला.. ना हवा शुद्ध राहीली ना पाणी… त्याला स्वताला देखील यासाठी खूपच धावाधाव करावी लागत आहेच… मुबलक होतं तेव्हा त्याने नुसती नासाडीच केली. जे जे आयतं मिळत गेलं ते ते नुसतं ओरबाडत गेला… त्याचं भवितव्य उजाडत गेलं नि आपलं मात्र उजाडलं गेलं… कधी भविष्यातील पिढीचा विचार त्यानें केलाच नाही… ना स्वताच्या ना इतर प्राणांच्या.. माणूसकीला कधीच हद्दपार करून बसलेला भूतदयेला कितीसा जागणार म्हणा… आणि मगं भोगावी लागताय त्या दुष्परिणामांची फळं त्याच्याबरोबर विनाकारण आपल्याला… जो चोच देतो तो चारा देखील देतो हे कोरडं तत्वज्ञान ठरलयं आताच्या या काळात.. त्या माणसाचा अलिकडे काही भरंवसाच देता येत नाही.. कुठच्या क्षणाला कसा वागेल ते देवाला देखील सांगता येणार नाही… आता हेच बघा ना ज्या दोरीवर आपण बसलोय ती आपल्या आधाराची जरी असली तरी खऱ्या अर्थाने ती आपल्या आयुष्याची दोरी आहे बरं.. ती कुठून कशी तुटेल, तो माणूस कधी तोडेल,हे काही सांगता यायचं नाही.. ती तशी तुटलीच तरी आपल्या जीवाला धोका असणार नाही.. आपण लगेच सावधगिरीने हवेत पंख पसरून विचरू लागू… मात्र मागच्या पानावरून पुढच्या पानावर आपलं विस्थापिताचं पुन्हा नव्याने जगणं सुरू होताना किती जण मागे उरतील हे त्या परमेश्वरालाच माहीत असेल…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “आली गाडी.. गेली गाडी..…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “आली गाडी.. गेली गाडी…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

“सांगितलं कि गं तुला कितीतरी बाऱ्या!… माझ्या गावा कडं येताना तू मोकळीच येऊ नगंस म्हनून!… तिकडनं मंमईहून येताना माझ्या सासुरवाशीण लेकीला संगट घेऊन येशील, चार दिवस आपल्या म्हातारीला भेटायला… पन तू काय मनावर घायचं नावं घेत न्हाईस!… अन फुकाच्या मातूर दिसरातीच्या सतरा बाऱ्या येरझारा घालतीस… तसं तुला काय गं कुणाच्या सुखदुखाचं काय पडलेललं नसतयं म्हना!… तू जोडून घेतलेला हाय नव्हं त्यो चौवीस डब्यांचा बारदाना… आमच्यावानी संसाराचा ओढत जातीस तुझा गाडा…बाया बापड्या, बापयं गडी मानूस, लेकरं बाळं, ट्रंका, बोचकी, पिशव्या नि हबशींनी ओतू जातोय डब्बा डब्बा… जसा जीवनाच्या प्रवासाला निघतातं तसं…कुणी हसतया,कुणी रडतया तर कुणी इवळतया तर कुनाची कुजबूज, शबुद नसलेली धुसफूस तर कुनाची कावाकाव…तुला यातलं काही कळंत नसतया तुझी असती रूळावरून वाघ पाठीमागं लागल्यासारखी धावाधाव…जाशील तिकडं मुलूख तुला थोडा जसा दक्षिणेतलं रामेश्वर अन उत्तरेतलं काशी…सगळीच अनोळखी कुणं कुणाची कशाला करतीय चवकशी… जो तो इथं वागतोय तालेवार असल्यावानी…सगळ्यांना घेतीस सामावून तू आपल्याच पोटात.. अन जो तो असतो आपल्याच नादात.. कुणाचं दुखलं खुफलं… मन फुलून आलं आनंदान.. तुला गं पडाया कशाची फिकीर.. शिटीवर शिटी फुंकत जातीस वरडत नि एकेक स्टेशान मागं सोडंत.. जत्रा भरेली फलाटावरची चढ उतार होतेय तू आल्यावर… वाईच पोट होतयं तुझं  ढवळल्यागत… पर तुला काहीच फरक पडतो काय… फलाटाला सोडून गेल्यावर त्या फलाटाचा उसासा तुला कधी कळतो काय?… साधू संतावानी तू अशी कशी गं निर्लेपवानी… अन तुला कसं कळावं एका आईचं आतडं कसं तिळ तिळ तुटतयं  लेकीच्या भेटीसाठी.. चार वर्षांमागं लेकीला गं सासरला धाडलं…काळजाचा तुकडाच दूर दूर गेला नि भेटीगाठीला गं आचवला… सांगावा तो तिचा यायचा सठीसाही माहीला सुखी आहे पोरं कानात सांगुन जायचा.. परी पोरीच्या भेटीसाठी जीव तो आसुसलेला असायचा… लिहा वाचायची वानवा हाय माझ्याजवळ..पतुर पाठवाया  उभा राहायतयं धरम संकट.. फोनची श्रीमंती आमच्या खेड्यातपतूर पोहचलीच नाही… बोलाचाली चा मायेचा शबुद सांग मंग कानावर कसा पडावा बाई..इकडच्या धबडगा घराचा उंबरठा नि शेताचा बांध कधी मला गावाची वेस वलांडून देईनात खुळे… अन तिकडं पोरीला सासरच्या जोखडात अडकवून टाकतात कारणांचे खिळे… मग तुझा घ्यायचा आधार असं मला लै मनात आलं.. म्हटलं तू सारखी ये जा करतीस लाखावरी माणसांची ने आण करतीस मगं तुला माझ्या पोरीला एकडाव तरी संगट घेऊन यायला जड कशाला जाईल.. अगं चार दिसं नसंना पण उभ्या उभ्या येऊन पोरं जरी येऊन भेटून, नदंरला पडून गेली तरी बी लै जीवाला बरं वाटंल बघ.. सकाळी सकाळी तू तिला इथं सोडायचं अन रातच्याला माघारी घेऊन जायचं… तू म्हनशील मगं तूच तसं का करीनास… न्हाई गं बाई… पोरीची अजून कूस उजवली नाही तवर तिच्याकडं जाता येत न्हाई हि परंपरा हायं आमची… तवा तुझ्याकडं पदर पसरून मागणं केलं… काही बी करं कसं बी जमवं पण एक डाव, या वेड्या आईला तिच्या पोरीची भेट एवढी घडवं… आणि पोरीला आणशील तवा हसऱ्या चेहऱ्याने  निळ्या धुराचा पटका हवेत उडवत, आनंदाचा हिरवा बावटा फडकत फलाटावर येशील… गळाभर लेकिला तिचं मी भेटल्यावर मायेच्या पायघड्या घालून तिला माहेराच्या घराकडं नेईन…औटघटकेचं का असंना पण माहेरपण करीन…आणि…रातच्याला पाठवणी करायला येईन तवा तू वेळ झाली निघायची म्हणून शिटीवर शिटी फुंकत…अंधारातल्या आकाशात ताटातुटीचे उमाळाचे काळे सावळे धुराचे सर रेंगाळत सोडशील…अन फलाट सोडून निघशील तेव्हा जड अंतकरणानं पाय टाकत पुढे पुढे जाताना… क्षणभरासाठी का होईना लालबावट्याला बघून थांबशील… वेड्या आईकडं  पोरीनं  पुन्हा एकदा मान वेळावून खिडकीतून बघितलं का याचा अंदाज घेशील… दोन निरोपाचे आसू गालावर टपकलेले निपटलेले  दिसल्यावर तू तिथून हलशील… इतकचं इतकचं माझ्यासाठी करशील… करशील नव्हं… “

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “डोंगराला आग लागली पळा रे पळा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “डोंगराला आग लागली पळा रे पळा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

“रे बाबल्या खयं असा तू?… रे मेल्या घरात असा कि खयं बाहेरच खपलसं!… आणि मंदा वहिनी घरात असात का रे. ?.. “

” व्हयं ता आम्ही दोघेवं बी या टायमाक घरात असा नाय तर काय शांता दुर्गेच्या राउळात झांज वाजवूक बसतत!… काय तरी इचारतस!… ता जाऊ दे.. तू फोन कित्येक केलसं ता सांग आधी?… एकाच वाडीतले शेजारी असां तरी तुका घराक येऊन बोलू झाला असताना… घराक आग लागल्याची वार्ता अर्जंट देयाला फोन केलसं काय मरे!… वश्या !काय झाला ता आधी इस्कटून सांग?… शिरा पडली तुझ्या तोंडावर ती!… “

” रे बाबल्या आग माझ्या घराक नाय तर तुझ्या घराक लवकरच लागतली समजला!… मी तुका आधीच सावध करान राहिलो… तू येळेलाच शाना झालसं तर तुझो घरदार आबाद रव्हता… मंगे तू आनी तुझा नशीब!… “

“वश्या! आज जरा जादाच घेतलसं काय?… अजून बी तू कोड्यात बोलून रव्हलसं!… रे मी मंत्रालयातला पट्टेवालो असा तुझ्या सारखो पिऊन नाही.. तेवा माझ्या खोबडीला समजेल असा बोल ना रे… काय तुका बोनस मिळालो!, का महागाईभत्याचा डिफरन्स गावलो!.. का तुका चायपानीची लाटरी लागली!… काय असेल ते सांगून टाक ना लवकर…”

“रे बाबल्या!… काय सांगू तुका? अरे तू म्हणतसं ता सगळा माका कालच हाती मिळाला… अरे ता हिन्दी पिक्चर मधे नाय का बोलत भगवान जब भी देता है तो छप्पर फाडके देता है… साला माझा नशिब बघ तसाच फळफळला… घरी बाईल एव्हढी खूश झाली म्हनुन सांगू… तिने माका तसाच बाजारात घेवोन गेला… आनि बाबल्या तुका सांगतय तिने डझनावारी साड्या, ड्रेसेस, बेडशीटा, चादरी.. काय नि काय इतकी खरेदी केलीन कि सगळो भरलेलो खिसो सुफडा साफ झाल्यावरच घराकडे परत इली… एक तांबडो पैसौ देखील त्यातला तिने शिल्लक तर ठेवलो नाय.. ना माका एक चड्डी बनियन घेतल्यान… वर माका नाकाचा मुरका मारून बोलला लगीन झाल्या पासून आज माझी होसमौज काय ता पुरी झाली… जल्माचा दळिंदर ता गेला… आता ह्या घेतलेल्या सगळ्या साड्या, ड्रेसेस, समंधा आधी त्या मंदेक दाऊन आल्याशिवाय माझो जीव शांत व्हायचो नाय… नाकझाडी मेली.. दर महिन्याला साडी ड्रेस आणल्यावर मला दाखवायला घेऊन येऊन मला जळवायची… आमच्या ह्यांका पट्टेवाले असले तरी रोजचो खुर्द्याने खिसो भरान घरी येततं… भावजी पिऊन असतले तरी त्यांका एक दमडीची चायपानी कसा मिळना नाय… असा महणून माका चिडवून जाता काय… आता तिका इतकी गाडाभर खरेदी घरी जाऊन दावतयं नि तिची अशी जिरवतयं कि त्येचा नावं ते… पुन्हा म्हणून या विमलाच्या नादी लागू नको असा तिका धडा शिकवूनच येतेयं… बघाच तुम्ही… असा माका टेचात बोलून सगळी खरेदी कमरेला धरून तुझ्या घरा कडे निघाली असा… माका इचारशील तर तू आनि मंदा वहिनी जसे असाल तसे घराबाहेर पडान खरा खराच शांता दुर्गाच्या राउळात जा… तुम्ही घरी नाय बघून विमला घरी रागे रागे परत येतली.. नि मगे तिचो राग शांत झाल्यावर मीच तुमका घरी बोलवेन… तसा तुका जमना नसेल तर माका माफ कर… नि घे मंगे घराक आग लावून… एक इमानदार दोस्ताचो सल्लो असा… बघ तुका किती पटता ता…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “ भुरूभुरू पाऊस, गरमागरम काॅफी आणि तो…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “ भुरूभुरू पाऊस, गरमागरम काॅफी आणि तो…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

तसंही तुझ्या बोलण्याला धरबंध काही असतो का…

घटकेत एक बोलतोस तर घटकेत दुसरचं सांगतोस..

वर सांगतोस मी काय म्हणतोय ते समजतंय का तुला…

मी एकशे ऐंशी कोनात फक्त मान वळवते.. आणि तुला विचारते याचा अर्थ समजलाच असेल की तुला… तुला माझा राग येतो… नि म्हणतो हि काय चेष्टा आहे.. साधं हो कि नाही हे सांगताही येऊ नये तुला.. माणसानं समजावं तरी काय?..

कळलं की नाही कळलं…

अगदी हेच हेच होतं माझं तू जेव्हा घटकेत कधी हे तर पुढच्या घटकेत कधी ते… कसं समजून घ्यावं रे माणसानं… जेव्हा दोन अगदी विरुद्ध टोकाच्या गोष्टी एकाच वाक्यात येतात तेव्हा… मग इतकाच समज होतो माझा तुझाच काहीतरी गोंधळ उडालाय आणि त्यात तू पुरता अडकलायस… तुझं तुला तरी नीट कळलं आहे कि नाही कुणास ठाऊक…. आडातच नाही तर….

आताचीच गोष्ट घे… बाहेर पावसाच्या हलक्या हलक्या सरी पडत आहे… आणि आपण दोघे कोपऱ्यावरच्या कॅफेच्या व्हरांड्यात गरम गरम काॅफीचा मग हाती धरून… टी. एलिएडसच्या कवितेवर बोलत बसलोय… नव्हे नव्हे मी बोलतेय आणि तू ऐकतोस आहेस… निदान तसं तुझे कान माझ्याकडे आहेत म्हणून मला तसं वाटतं… आणि तुझे डोळे मात्र बाहेर पडणाऱ्या पावसावर खिळलेत… माझ्या नजरेतून ते काही सुटलेलं नसतं… पण यावरची गंमत म्हणजे तुझं मनं… ते तर काॅफी, कॅफे, मी आणि तो पाऊस या सगळ्याची क्षणभरच दखल घेतं नि पसार झालेलं असतं… अगदी तुझ्याही नकळत आणि मला ते जाणवतं तुझ्या बोलण्यावरून… तू बोलत जातोस…

… खरंच आता या पावसात मनसोक्त भिजावं अगदी मनमुराद.. वयं विसरून तु आणि मी.. किती मजा येईल… आता पावसाची एक सर आपल्या टेबलकडे वळते आणि तू बोलतोस अशात एक कोवळं उन पडावं.. श्रावणमासा सारखं… उन पावसाचा खेळ इंद्रधनुष्यात बघायला मिळावा… पाऊस थबकतो आणि काळ्या ढगाच्या रघाआडून सूर्य आळसावून डोकं बाहेर काढत आपले डोळे किलंकिले करत किरणांची उघडझाप करू लागतो… पावसाच्या सरीत मी अल्लड नवतरुणी सारखी लाजेने चूर चूर होऊन इंद्रधनू सारखी गोरी मोरी तुला दिसते तेव्हा.. तू पुढे बोलतोस अशा वेळी एक वाऱ्याची थंडगार झुळूक यावी आणि तिने या पावसाच्या सरी वर सरी पडत राहणाऱ्या या नव तरुणीच्या अंग कांती वर हलकासा शिरशिरीचा काटा फुलून यावा… तो तिच्या अंगोपांगाला लपटलेला पदर देखिल वाऱ्याच्या झुळकेवर थरथरत पसरून जावा… अगदी ते तसेच चित्र उभं राहतं तुझ्या नजरेसमोर आणि तू बोलतोस… यावेळी मग हातात असावा काॅफीचा मग… सोबत असावी कवितावेडी मैत्रीण.. टी. एलिएडसची कविता वाचत… इतकं रोमॅन्टिक वातावरणात असेल तर… तारूण्यचा बहर कधीच संपू नये असं का बरं वाटणार नाही… कारण तेच तर रसिक असतं मन… अक्षर, अमर्यादित असल्यासारखे…. बाकी सगळ्यांना मर्यादा असतात.. पाऊस, वारा, ऊन, तन.. सगळं सगळं कधी तरी थांबतच असतं….

तू असाच वाहत वाहत जात असतोस.. आणि मी तुला म्हणते

तसंही तुझ्या बोलण्याला धरबंध काही असतो का…

घटकेत एक बोलतोस तर घटकेत दुसरचं सांगतोस..

वर सांगतोस मी काय म्हणतोय ते समजतंय का तुला…

आणि मी वेडी कवीता तुझ्या बोलण्याच्या मतितार्थाला शब्दांच्या जंजाळात अडकवू पाहते… काही बोलले शब्द हाती सापडतात तर काही तसेच बरेचसे सटकतात… मी फक्त तेव्हा

मी एकशे ऐंशी कोनात फक्त मान वळवते.. आणि.. आणि….

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “प्राक्तन…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “प्राक्तन…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… ज्याचं त्याचं प्राक्तन किती वेगवेगळं असतं… हे जागतिक सत्य आहे आणि ते सर्वांना विदीत असतचं… फरक एव्हढाच असतो आपल्या सगळ्यांना मात्र हवं असतं फक्त अनुकूल असणारं प्राक्तन… म्हणजे बघा अथ पासून इति पर्यंत.. नव्हे नव्हे आदी पासून अंतापर्यंत अर्थात जन्मापासून ते मृत्युपर्यंत सगळा आयुष्याचा प्रवास कसा सुशेगात आणि सुखात होईल.. आता त्या मिळणाऱ्या सुखाची मात्रा थोडीफार कमीजास्त चालते पण अगदीच सुख मिळूच नये अशी भावना कधीच नसते बरं त्यात… तो आला राजा सारखा, सुखाचा जगला नि गेला अशी मागची जगरहाटी बोलत राहावी हिच एकमेव इच्छा असते…. पण पण…

प्राक्तनाचं दान देणाऱ्याच्या मनात नेहमी वेगळचं काहीतरी असतं… आपल्याला कायमचं ते गुढ असतं, रहस्यमय असतं… चारचौघांसारखाच असणारा आपला हा आयुष्याचा प्रवासात सतत आपल्या वाट्याला नेहमीच इतरांपेक्षा वेगळचं येत असतं… अनाकलनीय गोष्टी घडत असतात… अगदी कितीही पद्धतशीरपणे नियोजनबद्ध जगायचं आपणं ठरवतो हो पण तो नियंता तिसरचं आपल्या भाळी मारत असतो…घालमेल होते तेव्हा आपल्या जिवाची… सगळ्यांनाचं भलं करणार आपल्यालाच कसा विसरला असा प्रश्न पडतो.. आणि गमंत म्हणजे हे असं प्रत्येकाच्या मनात तस्सचं येतं.. मग तुम्ही कसंही जगा.. स्वतःसाठी, दुसऱ्या साठी काहीही फरक पडत नाही… जे जे होणार ते ते ठरल्याप्रमाणे तसेच होणार… ना आपल्याला ना दुसऱ्याला त्यात काडीमात्र बदल घडवून  आणता येत नाही… साधी गोष्ट जन्म कुठे कधी व्हावा ते शेवटचा श्वास कधी कुठे सोडून द्यावा आहे का आपल्या हातात… मग या दोघांच्या मधल्या प्रवासातील अनेक गोष्टींचा आयुष्यभर आटापिटा करत असतो तो अनुकुलता असावी… पण प्रतिकुलतेची छाया सतत मंडरत राहते आणि आपला संघर्ष तिथे सुरू असतो… क्षणाचा आनंद मिळतो आयुष्याची बाजी लावून… संघर्षात उभे असतात आपलेच म्हणवारे,शत्रू, हितचिंतक… मुखवटे घातलेले चेहरे दाखवून…आणि आणि यादी कितीही मोठी करता येईल… तर हा सगळा प्रपंच आठवला कशावरून… ते प्राजक्ताचं फुल दिसलं आणि हा फापट पसारा मांडत गेलो…

प्राजक्ताचं इवलं इवलसं नाजूक सुकोमल फुलं बघाना..  उमलून येतं तेव्हा सुंगधाने  किती परिलुप्त असतं.. फांदी फांदीवर लगडलेलं दिसतं.. किती किती प्रसन्न, टवटवीत नि आनंदविभोर असतं ते स्वतः आणि इतरांनाही ते तसाच अनुभव देतं… त्या प्राजक्तांच्या फुलांकडे बघताना प्रत्येकाला त्या फुलांबदल प्रेम हे वाटतचं… असं वाटतं या फुलानं असचं कायम या फांदीवर झुलत राहावं… पण तो वाहणारा वारा मात्र दोषाचा धनी होतो… अगदी मंद झुळूकेच्या रूपात वाहत  जातो तेव्हा तो या निष्पाप फुलांना फांदी वरून अलगदपणे उचलून घेऊन जातो आणि आणि मधेच जड झाले बुवा आता तू माझ्या मागे मागे चाली चाली करत ये बरं असं सांगून त्या फुलांना तो जमिनीवर सोडून जातो… काही वेळ ती अबोध फुलं जमिनीवरून देखील वाऱ्यासह घरंगळत पुढे पुढे जाउ लागतात… पण तो प्रवास अल्पजीवी असतो.. त्यांचं सुकोमल देह धुळीत, मातीत लोळून गेल्यानं दगड धोंडे यांसारख्या अडथळ्यांना तटल्याने   थकून जाऊन गलितगात्र होऊन मातीमय होतात… आपला शेवटचा श्वास त्या मातीमध्ये घेताना त्या मातीला आपला सुगंध अर्पण करून जातात… जवळपास सगळ्या फुलाचं असचं होतं… पण काही फुलं वाऱ्याने इतस्ततः होतात., भरकटतात… एकटीच पडतात… शोध घेत असतात इतरही फुलांचा ती कुठे आहेत… पण तो शोध कधीच लागत नाही… मग एकटेच पडल्याने त्यांच्या नशीबी बेवारसाचं मरणाला सामोरं जावं लागतं…जगणं आनंदाचं झालं वाटतं नाही तोच बाभळीच्या काट्यासारख्या झाडांच्या फांदीत अडकून पडणं होतं.. अरे तू कोण आहेस.. आणि इतका सुंदर सुगंध तुझ्याजवळ कोठून आला… थोडा आम्हालाही तो सुंगधानं न्हाऊ घालना.. नाही तरी आमच्या जगण्याला तसा काहीच अर्थ उरलेला नाही… ना आमच्या कडे कधी कोणी ढुंकूनही पाहिले जात नाही… आज तू आमच्या तावडीत बरा सापडला आहेस.. तेव्हा आमचं सगळ्याचं जिणं सुगंधीत करं बरं… असं म्हणून  त्या प्रत्येक काट्याने त्या फुलाला कवटाळून घेण्यास सुरुवात करायला घ्यावी… या काट्यांच्या धुसमुळेपणाने त्या प्राजक्ता च्या फुलाच्या नाजूक देहाला कैक ओरखडे बसू लागतात…एकेक पाकळी विर्दिण होत जाते.. छिन्नविछिन्न  होते.. केशरी देठ अलग होऊन  तो एकिकडे खाली मातीत पडतो  नि त्या त्या पाकळ्या आपला निश्वास सोडत दूर दूर मातीत गलितगात्र होऊन पडतात… त्या आक्रस्ताळी काट्यांना प्राजक्ताचा  सुगंध तर मिळालाच नाही… उलट  जनमानसाकडून त्याच्या या कृत्याची निर्भत्सना मात्र त्यांची  झाली… अरसिक,निर्दयी मनाचे काट्यांनी अखेर त्या चुकलेल्या फुलाची जीवन यात्राच संपविली…. मग कुणी सात्वंनपर म्हणत गेलं त्याचं प्राक्तनच तसं होतं… आगळं वेगळं जगावेगळं… क्षणभंगुर जीवनात सुगंधाची बरसात करून जगलं… मी नियंता असूनही मला त्या प्राजक्ताच्या सुंगधाला वंचित व्हावं लागावं हा केव्हढा दैवदुर्विलास आहे…त्या नियंत्याला सुध्दा एक वेळ मनात किंतु चा कंटक टोचत राहतो…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares