मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वन बेडरुम फ्लॅट…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “वन बेडरुम फ्लॅट” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

माझ्या वडिलांचे स्वप्न होते, की मी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करून अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीला लागावे. जेव्हा मी अमेरिकेत आलो, तेव्हा हे स्वप्न जवळपास पूर्ण होत आले होते.

आता शेवटी, मला जिथे हवे तिथे मी पोहोचलो होतो. मी असे ठरवले होते की पाच वर्ष मी इथे राहून बक्कळ पैसा कमवेन, जेणेकरुन भारतात गेलो की पुण्यासारख्या शहरात सेटल होईन.

माझे वडील सरकारी नोकरीत होते. त्यांची आयुष्यभराची कमाई म्हणजे एक बेडरुमचा फ्लॅट अन तुटपुंजी पेन्शन. पण मला त्यांच्यापेक्षा जास्त कमवायचे होते. घरची, आई-बाबाची खूप आठवण यायची. एकटं वाटू लागायचं. स्वस्तातलं एक फोन कार्ड वापरून मी आठवड्यातन २-३ वेळा त्यांना कॉल करत होतो. दिवस वार्‍यासारखे उडत होते. दोन वर्षं पिझ्झा- बर्गर खाण्यात गेली. अजून दोन वर्षं परकीय चलनाचे दर पाहण्यात गेली. रुपयाची घसरण झाली की मला जाम आनंद व्हायचा.

लग्नासाठी रोज नवनवीन स्थळ येत होती. शेवटी ते करण्याचा मी निर्णय घेतला. आईवडिलांना सांगितले, मला फक्त दहा दिवसांची सुट्टी मिळेल. त्या दहा दिवसातच सर्व काही झालं पाहिजे. स्वस्तातलं तिकीट पाहून मी दहा दिवसांची सुट्टी घेतली. मी खूश होतो. आईबाबांना भेटणार होतो. नातेवाईक व मित्रांसाठी खूप सार्‍या भेटवस्तू घ्यायच्या होत्या, त्याही राहून गेल्या.

घरी पोहोचल्यावर आलेल्या सर्व स्थळांचे फोटो मी पाहिले. वेळ कमी असल्याने त्यातीलच एका मुलीची निवड केली. मुलीचे वडील समजूतदार होते. दोन दिवसांत माझे लग्न लागले. खूप सारे मित्र येतील, असं वाटत असताना फक्त बोटावर मोजता येतील, इतकेच मित्र लग्नाला आले.

लग्नानंतर काही पैसे आईबाबांच्या हातावर टेकवले. “आम्हाला तुझे पैसे नकोत रे पोरा. पण वरचेवर भेटायला येत जा, ” असं बाबांनी सांगताना त्यांचा आवाज खोल गेला होता. बाबा आता थकले होते. चेहर्‍यावरच्या सुरकुत्या, पिकलेल्या भुवया त्याची जाणीव करून देत होत्या. शेजार्‍यांना त्यांची काळजी घेण्याची विनंती केली व आम्ही अमेरिकेला पोहोचलो.

पहिली दोन वर्षं बायकोला हा देश खूप आवडला. वेगवेगळे स्टेट्स अन नॅशनल पार्क पाहुन तिला भारी वाटत होतं. बचत कमी होऊ लागली, पण ती खूश होती. हळूहळू तिला एकाकी वाटू लागलं. कधीकधी ती आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा भारतात फोन करु लागली. दोन वर्षांनी आम्हाला मुले झाली. एक मुलगा अन एक मुलगी. मी जेव्हा जेव्हा आईबाबांना कॉल करायचो, तेव्हा तेव्हा ते नातवंडाना घेऊन भारतात येण्याची विनवणी करायचे. त्यांना नातवंडाना पाहायचे होते.

दरवर्षी मी सहकुटुंब भारतात जायचे ठरवायचो. पण पैशाचं गणित काही जुळायचं नाही. जाण्याचा बेत रद्द करावा लागायचा. वर्षामागून वर्षं सरत होती. भारतात येऊन जायचे स्वप्न लांबत चालले होते.

एक दिवस अचानक ऑफीसमध्ये असताना भारतातून कॅाल आला, “मोहन, बाबा सकाळीच गेले रे”. खूप प्रयत्न केला, पण सुट्टी काही मिळाली नाही, अग्नीला तर सोडाच, पण नंतरच्या विधींनापण जायला जमलं नाही. मन उद्विग्न झालं. दहा दिवसात दुसरा कॅाल आला, आईची पण प्राणज्योत मालवली होती. सोसायटीतील लोकांनी विधी केले. नातवंडांचे तोंड न पाहताच आई-वडील ह्या जगातून निघून गेले होते.

आई- बाबा जाऊन दोन वर्षं सरली. ते गेल्यानंतर एक पोकळी तयार झालेली. आईबाबांची शेवटची इच्छा, इच्छाच राहिलेली.

मुलांचा विरोध असतानाही भारतात येऊन स्थिरस्थावर होण्याचे मी ठरवले. पत्नी मात्र आनंदात होती. राहण्यासाठी घर शोधत होतो, पण आता पैसे कमी पडत होते. नवीन घरही घेता आले नाही. मी परत अमेरिकेत आलो. मुले भारतात राहायला तयार नसल्याने त्यांनापण घेऊन आलो.

मुले मोठी झाली. मुलीने अमेरिकी मुलासोबत लग्न केलं. मुलगाही आनंदात अमेरिकेत राहतो.

मी ठरविले, आता पुरे झाले. गाशा गुंडाळून भारतात आलो. चांगल्या सोसायटीत ‘दोन बेडरुमचा’ फ्लॅट घेण्यापुरते पैसे माझ्याकडे होते. फ्लॅटही घेतला.

आता मी साठ वर्षाचा आहे. ह्या ‘दोन बेडरुमच्या’ फ्लॅटमधे आता मी फक्त एकटाच राहतो. उरलेलं आयुष्य जिच्यासोबत आनंदात घालवायचं ठरवलेलं, तिने इथेच जीव सोडला.

कधीकधी मला वाटते, हा सर्व खटाटोप केला, तो कशासाठी? याचे मोल ते काय?

माझे वडील भारतात राहत होते, तेव्हा त्यांच्या नावावरही एक फ्लॅट होता. माझ्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त काही नाही. फक्त एक बेडरुम जास्त आहे. त्या एका बेडरुमसाठी मी माझे आईवडील गमावले, मुलांना सोडून आलो, बायको पण गेली.

खिडकीतून बाहेर पाहताना मला माझे बालपण आठवते. त्या सुंदर आठवणी मनात फेर धरू लागतात.

अधूनमधून मुलांचा अमेरिकेतून फोन येतो. ते माझ्या तब्येतीची चौकशी करतात. अजूनही त्यांना माझी आठवण येते, यातच समाधान आहे.

आता जेव्हा माझा मृत्यु होईल, तेव्हा कदाचित शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करतील. देव त्यांचं भलं करो.

पुन्हा प्रश्न कायम आहे – हे सर्व कशासाठी अन काय किंमत मोजून?

मी अजूनही उत्तर शोधतोय.

फक्त एका बेडरुम साठी?

जगण्याचे मोल त्यापेक्षा कितीतरी पट जास्त आहे. त्यासाठी आयुष्य पणाला लावू नका.

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “रांगोळीचा किस्सा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “रांगोळीचा किस्सा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक 

आजेसासूबाई आंघोळ उरकून, बाहेर तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढत होत्या. अनेक ठिपक्यांच्या रांगा आणि त्यांच्या सुरकुतलेल्या बोटांमधून भरभर पडणारी, न तुटणारी, ओल्या तांदूळ पिठाची ओळ. बघता बघता माझ्या डोळ्यांसमोर अनेक पाकळ्यांचं कमळ तयार झालं, तेही ओळ कुठेही न तुटता.

थोड्या वेळाने बेल वाजली. मी दार उघडलं. रोजचा भाजीवाला आला होता. त्याने आपली टोपली खाली ठेवली तर त्याचा तोल थोडा सुटून, रांगोळीच्या एका पाकळीवर ती पाटी घासली. अजून तांदूळ पिठाच्या ओळी सुकल्या नव्हत्या. त्यामुळे ती पाकळी साहजिकच विस्कटली. आजींनी इतका वेळ खपून काढलेली रांगोळी जेमतेम पंधरा मिनिटंसुद्धा टिकली नव्हती. मला खूप वाईट वाटलं.

मी त्या भाजीवाल्यावर ओरडणार, इतक्यात आजीच बाहेर आल्या.

त्यांनी भाजी घेतली, पैसे दिले आणि त्या परत आत निघून गेल्या. विस्कटलेल्या रांगोळीकडे त्यांनी पाहिलं, पण काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मी मात्र खूप वेळ हळहळत होते.

नंतर दुपारी जरा निवांत बसलो असता, मी आजींना विचारलं, इतकी खपून काढलेली सुरेख रांगोळी पंधरा मिनिटंसुद्धा टिकली नाही. तुम्हाला वाईट नाही वाटलं ?

त्या हसल्या. म्हणाल्या, रांगोळी काढीत होते तोवर ती माझी होती. ज्या क्षणी रांगोळी पूर्ण झाली, त्या क्षणी ती बघणाऱ्याची झाली. रांगोळी काढताना ज्या आनंदाची अनुभूती मला झाली होती, त्याच आनंदाची अनुभूती तुला रांगोळी बघताना झाली ना ? मग झाला रांगोळीचा उद्देश सफल !

इतकी मन लावून काढलेली सुरेख रांगोळी पूर्ण झाली, त्या क्षणी त्यांनी त्या रांगोळीतून स्वतःच्या भावना अलगद हलक्या हाताने सोडवून घेतल्या होत्या.

रांगोळीचा उद्देशच हा असतो. जीवन कितीही सुंदर असलं, तरी ते रांगोळीसारखंच क्षणभंगुर आहे, हे स्वतःला दररोज बजावून सांगण्याचा रांगोळी हा एक सुंदर मार्ग.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ लोकलचा प्रवास आणि लग्न… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

लोकलचा प्रवास आणि लग्न… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

नोकरीनिमित्त उपनगरातून मुंबईला लोकलने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे विवाह हे सहजासहजी मोडत नाहीत, अशी माहिती नुकतीच एका सर्व्हेमुळे समोर आली. यामागची कारणे जाणून घेण्यासाठी आमच्या काही प्रतिनिधींनी सोमवार ते शुक्रवार असा सलग पाच दिवस सकाळी कल्याण ते दादर असा ‘वरून’ येणाऱ्या गाडीने व पुन्हा सायंकाळी ‘दादर ते कल्याण’ असा लोकलचा प्रवास चक्क पिक अवर्समध्ये केला व त्यांना आलेल्या अनुभवांवरून यामागची काही कारणे शोधण्यात आम्हाला यश आले आहे.

सकाळी घरून निघताना एखादी फास्ट गाडी मनात ठरवून स्टेशनला यावे, तर ती गाडी वरूनच खचाखच भरून आलेली. मुंगीलाही आत शिरायला जागा नाही. नाइलाजाने ती गाडी सोडून हताशपणे दूर जाताना तिच्याकडे पहात बसायचे. नंतर एक स्लो लोकल.. बऱ्यापैकी रिकामी.. पण तुम्हाला नकोशी. मग शेवटी काँप्रोमाईज करून एक सेमीफास्ट लोकल पकडायची. ह्या रोजच्या प्रकारामुळे एक तडजोडीचा गुण माणसात तयार होतो. त्याला आवडणारी मुलगी त्याला नाकारून दुसऱ्याबरोबर लग्न करते तर जी याच्याशी लग्नाला तयार असते.. याला पसंत नसते. शेवटी घरच्यांच्या इच्छेप्रमाणे एका ‘अनुरूप’ मुलीशी विवाह करण्याची तडजोड तो याच प्रवासात शिकलेला असतो.

बरे.. तडजोड करून पकडलेल्या ह्या सेमीफास्ट गाडीतही लगेच सीट मिळत नाहीच. पण हा जरा धावपळ करून खिडकीत समोरासमोर बसलेल्या दोन माणसांच्या पुढ्यात जाऊन उभा रहातो. हे दोघे तर लवकर उठत नाहीतच; पण येणाराजाणारा प्रत्येक जण आपली बॅग स

शेल्फवर ठेवण्यास वा काढण्यास यालाच सांगत रहातात व त्यालाही तेथे उभे राहिल्याने हसतमुखाने हे काम करत राहावे लागते. यातून आपला काही फायदा असो वा नसो.. न थकता शेवटपर्यंत, इच्छा असो वा नसो.. हसतमुखाने सासुरवाडीच्या नातेवाईकांची कामे करण्याचा गुण यांच्या अंगी बाणला जातो.

अशा माणसांना गाडीत चढल्या चढल्या चुकून कधी बसायला जागा मिळालीच तर नेमके त्याच डब्यात कोणीतरी वृद्ध अथवा आजारी व्यक्ती चढते व त्याच्या समोर उभे राहून आशाळभूतपणे बघू लागते. इतर प्रवाशांच्या चेहऱ्यावरही याने उठून त्यांना जागा द्यायलाच हवी, असे भाव असतात. मग नाईलाजाने तो उभा राहून त्या वृद्धास वा आजाऱ्यास जागा करून देतो. यातूनच सासुरवाडीच्या वृद्धांची व रुग्णांची सेवा करण्याचा गुण वृद्धिंगत होतो.

लोकलच्या लेडीज डब्याचे नियम तर फार कडक. चुकून त्यात पुरुष शिरला तर बायकांचे शिव्याशाप.. क्वचित मारही खावा लागतो. त्यातून घोर अपमान व पोलिसांच्या हवाली होणार ते वेगळेच. यामुळेच चार बायका एकत्र दिसल्या की तेथून दूर होण्याच्या गुणाची निर्मिती होते. त्यामुळेच घरी हॉलमधे किटी पार्टी, भिशी, हळदीकुंकू वगैरे सुरू असल्यास हा त्यात लुडबूड न करता बेडरुममध्ये शांत पडून राहतो.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या लोकल प्रवासातून तयार होणारी प्रचंड सहनशक्ती. आपला चुकून धक्का लागला तरी खुन्नस देणाराच आपल्या शेजारी बसल्यावर मात्र पेपर वाचताना त्याचे कोपर पोटात खुपसतो.. समोरचा मोबाईल वाचता वाचता नाकात बोटं घालतो.. कुणाच्या घामाचा प्रचंड वास येत असतो.. एक ना अनेक नरकयातना या तासाभरात त्याच्या वाट्यास येत असतात व त्या शांतपणे भोगल्याने मनस्ताप सहन करण्याची प्रचंड ताकद यांच्यात तयार होते, जी संसारात पदोपदी उपयुक्त ठरते !

तसेच दिवसभर कितीही उंडारले तरी संध्याकाळी ठरलेल्या गाडीने ठरलेल्या वेळी घरी परत येणे, हाही एक वाखाणण्याजोगा गुण..

असे एक ना अनेक गुण आहेत जे पिक अवर्समधे प्रवास करणाऱ्यांच्यात निर्माण होतात, जे त्यांचे वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध करतात.

आमच्या प्रतिनिधींना आलेले हे अनुभव जेमतेम ५ दिवसांचे आहेत. पण आपण जर वर्षोनवर्षे असा प्रवास करत असाल व आपले याबाबत काही विशेष अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा !

लेखक : अज्ञात 

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मंत्रजागर… लेखिका: श्रीमती रश्मी साठे ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ मंत्रजागर… लेखिका: श्रीमती रश्मी साठे ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆

शिव्या दिल्यातर समोरचा क्रोधित होतो हे उदाहरण शिक्षित वा अशिक्षित सर्वांना पटण्यासारखे आहे.

मंत्र प्रभावा विषयी हा लेख वाचून एक नवीन सकारात्मक दृष्टिकोन मिळेल. 

केळीचे लोंगर बागेत दिसायला लागल्यावर वानरांनी बागेत येऊन धुडगूस घालायला सुरुवात केली. केळी, पपई …..  एकही फळ हाताशी लागेना. आमच्या जमिनीत वडाच्या झाडाखाली अक्कलकोट स्वामींचे मंदिर बांधलेय. देवळात वीज आल्यावर एक दिवस जपयंत्र आणलं. सूर्यास्ताला जपयंत्रावर गायत्री मंत्राचा जप सुरू करायचा, तो चांगलं उजाडल्यावर बंद करायचा. आठ पंधरा दिवसातच एक गोष्ट अनुभवाला आली. जपयंत्र जरी रात्री सुरू असलं तरी दिवसभर बागेत होणारा वानरांचा धुडगूस आपोआप बंद झाला. वानर बागेच्या कुंपणापर्यंत यायचे. पण बागेत यायचे नाहीत. नुकसान करायचे नाहीत. रात्रीच्या वेळी मात्र तोच कळप तळ्याकाठच्या त्याच झाडावर वस्तीला असायचा. आज घराभोवती पाच फळबागा उभ्या राहिल्या असून वानरांमुळे होणारं नुकसान पूर्णपणे थांबलं. गायत्री मंत्र आणि वानर यांचा नेमका काय संबंध –  हे मात्र अनाकलनीय आहे. आज अनेक शेतकरी हा अनुभव प्रत्यक्ष घेत आहेत.

‘रानगोष्टी’  या डॉ. राजा दांडेकर यांच्या पुस्तकातील हा उतारा. गायत्री मंत्राचा उत्तम महिमा सांगणारा. आजच त्याची आठवण होण्याचे कारण काय? कारण कोकणातील एक फेसबुक मित्र श्री. अविनाश काळे यांची पोस्ट. ‘कोकणचे दुःख कोणी दूर करेल ?’  ह्या मथळ्याच्या पोस्टचा मथितार्थ असा की कोकणातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान माकडे आणि वानरे यांच्यामुळे होत आहे. त्यांचा बंदोबस्त न झाल्यास कोकणातील शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ ओढवणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये वानर आणि माकड यांना उपद्रवी पशू जाहीर करून मारायला सुरुवात केली. महाराष्ट्रातसुद्धा असे करण्याची गरज आहे.

हे वाचताना गायत्री मंत्राचा प्रभाव आठवला. वानरे, माकडे यांना जीवानिशी मारण्यापेक्षा शेतकरी मित्रांनी हा साधा, निरुपद्रवी उपाय करून पहायला काय हरकत आहे ?

एखाद्या मंत्राचा प्रभाव मान्य करणे ही श्रद्धा की अंधश्रद्धा ? हा वाद जुनाच आहे. अशीही शक्यता आहे की एखादी विज्ञानाधिष्ठित गोष्ट देवाधर्माच्या नावे सांगितली की लोकांना पटते, ते ऐकतात. हे लक्षात आल्याने आपल्या पूर्वजांनी काही गोष्टी हुशारीने लोकांच्या गळी उतरवल्या असतील. आपल्याला त्यामागचे विज्ञान माहीत नसल्याने आपण त्याला अंधश्रद्धेचे लेबल लावून मोकळे होतो !

भारतीय मानसिकतेला मंत्राचा प्रभाव, त्यामुळे होणारे चमत्कार हा मुद्दा नवीन नाही. मूल अक्षरओळख शिकण्याच्या आधीपासून घरच्यांकडून रामायण, महाभारतातील गोष्टी ऐकू लागते. अक्षरे ओळखता येऊ लागली की पौराणिक कथा वाचू लागते. (आताच्या नवीन पिढीत बहुधा हे होत नसावं.) बालवयातच ‘कुमारी माता’ कुंतीची कथा सामोरी येते. कुंतीने मनापासून दुर्वास ऋषींची सेवा केल्याने त्यांनी संतुष्ट होऊन अपत्यप्राप्तीसाठी देवांना वश करण्याचा मंत्र तिला दिला. तिने कुतूहलापोटी मंत्रजप करून सूर्याला आवाहन केले. सूर्य प्रगट होताच भयभीत होऊन त्याला परत जाण्यास सांगितले. मात्र ‘मंत्र व्यर्थ होऊ शकत नाही’ असे सूर्य म्हणाला आणि सूर्यपुत्र कर्णाचा जन्म झाला.

भयकथा, गूढकथा यातही अघोरी विद्यांमध्ये विशिष्ट मंत्रांचे सामर्थ्य किती अचाट आहे, हे वाचायला मिळते. ‘वशीकरण मंत्र साक्षात मनुष्यरुपात प्रगट झाला’  वगैरे वाचताना मला भयंकर कुतूहल वाटत असे. जर खरेच असे काही प्रत्यक्षात घडत असेल तर ते आपल्याला निदान एकदा तरी बघायला मिळावे, असेही वाटून जाई.

विशिष्ट शब्द विशिष्ट पद्धतीने उच्चारणे म्हणजे मंत्र. या मंत्रोच्चारणाचा विधायक वापर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात करू शकलो तर आपले कितीतरी प्रॉब्लेम्स सुटतील ! खरंच मंत्रात शक्ती असते का ?   अलीकडेच  व्हाॅट्सॲपवर एक पोस्ट वाचायला मिळाली. त्यात या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. पोस्टचा मथितार्थ असा की एखाद्या माणसाने आपल्याला उद्देशून अपशब्द उच्चारले, शिव्या दिल्या तर आपल्याला संताप येतो. म्हणजेच त्या शब्दांमध्ये ताकद आहे. त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी तयार होते. ह्याउलट कुणी आपले कौतुक केले, प्रेमाने बोलले तर आपल्याला प्रसन्न, आनंदी वाटतं. म्हणजेच पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते अगदी ह्याच प्रकारे मंत्रातील शब्दांतदेखील ऊर्जा, सामर्थ्य असते. हे मंत्र आपल्या ऋषीमुनींनी, जे वैज्ञानिक होते, संशोधनातून सिद्ध केले आहेत.

सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड,विश्वविख्यात नेमबाज अंजली भागवत यांच्यासारखे अनेक खेळाडू ज्यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी जात होते ते क्रीडामानसशास्त्रज्ञ व माजी इंटेलिजन्स ऑफिसर भीष्मराज बाम यांनी हा मुद्दा अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितला आहे. ते म्हणतात,’ मंत्र म्हणजे काही शब्दांच्या किंवा वाक्यांच्या आधारे प्रगट होणारा एखादा प्रभावी विचार असतो. काही वेळा एखादा शब्द किंवा ओंकारासारखे अक्षर मंत्रजपासाठी वापरले जाते. तर कधी कधी काही ओळींचाही मंत्र असू शकतो. मंत्रजप हा एकाग्रतेसाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे. आपल्या विचारांवर आपला ताबा नसेल तर विचार भरकटतातच. पण त्यासोबत आपलीसुद्धा अत्यंत त्रासदायक अशी फरफट होते. विचारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी मंत्र उपयुक्त ! मंत्रातले शब्द ज्या अर्थाने वापरले असतील त्यावर तुमची पक्की श्रद्धा असायला हवी. म्हणून तर मंत्र हा तुमची ज्या गुरुवर श्रद्धा असेल त्याच्याकडून मिळवायचा असतो. किंवा तो मंत्र तुमच्या स्वतःच्या अनुभवातून सिद्ध झालेला हवा. मग आपोआप तुमची त्याच्यावर श्रद्धा बसते.’

प्रभावी स्वसंवाद ( स्वतःसाठी सूचना)  लिहून काढून त्याचा मंत्रासारखा वापर करण्याबाबतही बाम सरांनी लिहिले आहे. Winning Habits या त्यांच्या मूळ इंग्लिश पुस्तकाचा ‘विजयाचे मानसशास्त्र’ या नावाने वंदना अत्रे यांच्या सहाय्याने मराठी अनुवाद केला आहे.

दैनंदिन जीवनात मारुती स्तोत्र, रामरक्षा (किंवा आपले आवडते स्तोत्र / मंत्र) म्हटले की प्रसन्न वाटतं, नकारात्मक विचार पळून जातात हा अनुभव तर सर्वांनीच घेतला असेल. ‘अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमंत्रस्य’  अशीच रामरक्षेची सुरुवात आहे. बुधकौशिक ऋषींना स्वप्नात रामरक्षा स्फुरली. कुरवपूर (कर्नाटक) येथे श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) यांना ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’  या अठरा अक्षरी प्रभावी मंत्राचा साक्षात्कार झाला.

अखंड नामस्मरण, मंत्रजप यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात सकारात्मकता येत असेल, फायदा होत असेल तर ‘श्रद्धा – अंधश्रद्धा’ चा काथ्याकूट कशाला ? नियमितपणे, श्रद्धेने मंत्र जपावा हे उत्तम.

लेखिका: श्रीमती  रश्मी साठे

प्रस्तुती: श्रीमती स्वाती मंत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “प्रेम…” – कविवर्य कुसुमाग्रज ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “प्रेम…” – कविवर्य कुसुमाग्रज ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

प्रेम

प्रेम कुणावर करावं ?

प्रेम कुणावरही करावं.

 

प्रेम

राधेच्या वत्सल स्तनांवर करावं,

कुब्जेच्या विद्रुप कुबड्यावर करावं,

भीष्म द्रोणाच्या थकलेल्या चरणावर करावं,

दुर्योधन कर्णाच्या आभिमानी,

अपराजित मरणावर करावं

प्रेम कुणावर ही करावं.

 

प्रेम

रुक्मिणीच्या लालस ओठावर् करावं,

वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं,

मोराच्या पिसाऱ्यातील अद्भुत लावण्यावर करावं,

प्रेम काळजाच्या नात्यावर करावं,

आणि खड्गाच्या पात्यावरही करावं

प्रेम कुणावर ही करावं.

 

प्रेम

ज्याला तारायचाय त्याच्यावर तर करावंच

पण ज्याला मारायचंय त्याच्यावरही करावं,

प्रेम योगावर करावं,

प्रेम भोगावर करावं,

आणि त्याहूनही अधिक त्यागावर करावं,

 

प्रेम

प्रेम कुणावर करावं

प्रेम कुणावरही करावं.

कविवर्य वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)‍

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “ज्योत ज्योतीने जागवा…” – लेखिका: श्रीमती संजीवनी बोकील ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ “ज्योत ज्योतीने जागवा…” – लेखिका: श्रीमती संजीवनी बोकील ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

काही घटना, काही शब्द, काही ओळी काळजावर छिन्नीने अशा कोरल्या जातात की सदैव दिसत राहतात. काळाची धूळ बसली तरी तो झिरझिरीत पडदा त्यांचे अस्तित्व पुसू शकत नाही. कधीतरी आनुषंगिक संदर्भ ती धूळ पुसतात आणि मग ते कोरीव काम लख्ख दिसू लागते.

गेली अनेक वर्षे अशी अनेक कोरीव लेणी मनात टिकून राहिली आहेत.

काल आपटे हायस्कूलच्या एका माजी विद्यार्थ्याने एक जुना फोटो पाठवला. त्याच्या खाली त्याने लिहिले होते, ” बाई, सततआठवते का?”

ही आव्हाने जितकी नाजूक असतात, तितकीच मुश्किलही असतात. पण एखाद्या लहान मुलीने स्वतःच डोक्यावर चादर घ्यावी आणि काही क्षणात स्वतःच ती दूर करून बोळके पसरून हसावे तशी त्यांच्यावरची अनेक आवरणं झुगारून ती कधीकधी स्वतःच उघड होतात.

तसेच झाले आणि त्या फोटोतला काळ दूर गेलाच नसल्यासारखा समोर येऊन उलगडला.

परमवीरचक्र विजेत्या पैगंबरवासी अब्दुल हमीदच्या वीरपत्नीला शिवणकाम करून पोट भरावे लागते, अशा बातमीने व्यथित होऊन ती मी माझ्या ९ वी ब च्या वर्गात वाचून दाखवली. त्या व्यथेतून एक मोठा उपक्रम आकाराला आला-‘ पै. अब्दुल हमीद कृतज्ञता निधी. ‘७८ मुलांच्या वर्गानं स्वकमाईने ‘कृतज्ञता निधी’ उभारला. त्यात नंतर ९वी क देखील सामील झाला व समाजातल्या काही संवेदनशील व्यक्तींनीही थोडी भर घातली.

पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात, एका भव्य कार्यक्रमात, ल. आपटे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. पु. ग. वैद्य, श्री. शशिकांत सुतार, विक्रम बोके, पुण्यात स्थायिक झालेल्या परमवीरचक्र विजेत्या श्री. रामराव राणे यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती राजेश्वरी राणे आणि अभिनेते नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत दै. सकाळचे तत्कालीन व्यवस्थापक श्री. के मो. भिडे यांच्याकडे तो निधी जाहीरपणे सुपूर्त केला गेला.

याची दोन कारणे होती. एक म्हणजे तो उपक्रम दै. सकाळमधील बातमीमुळेच आकाराला आला होता आणि दुसरे म्हणजे हा निधी सार्वजनिक कामातून उभा राहिला होता म्हणून तो सार्वजनिक रूपातच जाहीरपणे हस्तांतरित होणे गरजेचे होते.

राखीपौर्णिमेचा दिवस यासाठी निवडला होता कारण ती भावनाही या कार्यक्रमाच्या मागे होती. मुलांच्या तुडुंब उत्साही गर्दीत कार्यक्रम शानदारपणे पार पडला. पाटेकरांनीही या निधीत मोलाची भर घातली. व्यासपीठावरच्या संपूर्ण कार्यक्रमातल्या सर्व भूमिका मुलांनी जबाबदारीने अचूक पार पाडल्या. कार्यक्रम संपल्यावर व्यासपीठावरच्या सन्माननीय व्यक्तींना भेटण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. त्यांच्यासाठी चहा-बिस्किटे सतत मागवली जात होती. टिळक स्मारकच्या खालच्या कँटिनमधून भरलेले ट्रे वर येत होते. माझ्याही भोवती गर्दी असल्याने मला याचा कोणताही हिशेब ठेवता येत नव्हता….

हळूहळू हॉल रिकामा होऊ लागला आणि कँटिनचे मालक श्री. भागवत माझ्याजवळ आले. त्यांच्या हातात झालेल्या चहापाण्याचे बिल होते. माझ्या पोटात गोळा आला. स्टेजवर जाणारे ते भरलेले ट्रे दिसू लागले. किती रक्कम मांडली असेल कोणास ठाऊक अशा विचारातच मी ते बिल हातात घेतले.

बिलातल्या रकमेच्या खालच्या जागेत लिहिले होते- ‘ही रक्कम आमच्यातर्फे आपल्या ‘कृतज्ञता निधी’त जमा करावी. ‘ उपक्रमाचे कौतुक करून, नमस्कार करून ते शांतपणे निघून गेले. शाळेत शिकवत असलेल्या कवितेच्या कोरीव ओळी माझ्या डोळ्यासमोर नाचू लागल्या-

‘ज्योत ज्योतीने जागवा

करा प्रकाश सोहळा

इवल्याश्या पणतीने

होई काळोख पांगळा. ‘

 * * *

आपटे प्रशालेच्या नववी ब व ९ वी क च्या मुलांनी हा ‘कृतज्ञता निधी’ जिच्या पाठीशी उभे राहण्यासाठी उभारला होता त्या वीरपत्नीला – श्रीमती रसूलन बेगम यांना उत्तर प्रदेशातील गाझियाबादपासून ८० किलो मीटर दूर असलेल्या धामुपूर येथे प्रत्यक्ष जाऊन तो देण्याची खूप इच्छा होती पण ते शक्य नव्हते.

दै. सकाळने मुलांचे कष्ट, त्यांच्या भावना व त्यांच्यातील सामाजिक कर्तव्यांचे भान यांचे मोल जाणून त्यांचे लखनौ येथील प्रतिनिधी श्री. शरद प्रधान यांच्याकडे हे काम सोपवले. मुलांनी वीरपत्नीसाठी हिंदी व उर्दूमध्ये लिहिलेले प्रातिनिधिक, हृदयस्पर्शी पत्रही त्यांच्याकडे दिले होते.

गाझियाबादपासून धामुपूर येथे जाण्यासाठी वेळेवर काही वाहन न मिळाल्याने श्री. प्रधान यांनी एका ट्रकचालकाला विनंती केली. त्यासाठी शंभर रुपये आकार मान्य करून प्रधान ट्रकमध्ये चालकाशेजारी बसले. वाटेत गप्पा सुरू झाल्या. इतक्या आडगावात हा सुशिक्षित माणूस कशासाठी चालला आहे, अशी उत्सुकता त्याला वाटणे स्वाभाविक होते. दूरवरच्या महाराष्ट्रातल्या एका पुणे नावाच्या गावातल्या शाळकरी मुलांनी स्वतः कष्ट करून हा निधी उभा केला आहे, हे कळताच त्याचे डोळे विस्फारले. “साब, इतने साल यहाँ से आते-जाते हॆं, कभी उनसे मिलने की भी बात हमारे दिमाग में नहीं आई और इतनी बड़ी बात इतनी दूर के छोटे बच्चों ने सोची?”

बोलता बोलता धामुपूर गाव दिसू लागलं. प्रधानांनी आपल्या पाकिटातून शंभराची नोट काढून चालकापुढे धरली. त्यांचे हात हातात धरीत चालक डोळ्यात पाणी आणून म्हणाला, ” नहीं, नहीं साहब! ये पॆसे लूँगा तो अपने आपको आइने में नहीं देख पाऊँगा! शरमिंदा मत कीजिए। चलो, इस बहाने हमसे भी देश की थोड़ी-सी सेवा हो गई।”

प्रधान खाली उतरले आणि ती नोट त्यांनी मुलांनी दिलेल्या मखमली बटव्यात सरकवून दिली. नंतर फोन करून त्यांनी ही गोष्ट मला कळवली व फोटो पाठवले.

एक शाळकरी ज्योत किती ज्योती लावत गेली…. गोष्ट जुनी पण आज आठवली.. !

(‘आत्मचित्र’ मधून) 

लेखिका: श्रीमती संजीवनी बोकील

संग्राहक  : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “क्रोधाचे पिशाच्च” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “क्रोधाचे पिशाच्च” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

एकदा भगवान श्रीकृष्ण, बलराम, आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात असताना, रात्रीच्या वेळी अंधारामुळे त्यांना रस्ता सापडला नाही.

जंगल घनदाट होते. तिथे न पुढे जाण्याचा मार्ग दिसत होता, न मागे फिरण्याचा.

तेव्हा तिघांनी ठरवले की, एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी मार्गस्थ व्हायचे.

तिघेही दमलेले होते, पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले.

पहिली पाळी सात्यकीची होती. सात्यकी पहारा करत असताना, झाडावरून एका पिशाच्चाने पाहिले की एक माणूस पहारा देतो आहे, आणि दोनजण झोपले आहेत.

पिशाच्च झाडावरून खाली उतरले व सात्यकीला मल्लयुद्धासाठी आव्हान देऊ लागले.

पिशाच्चाचे बोलणे ऐकून सात्यकी संतापला आणि क्रोधाने पिशाच्चावर धावून गेला.

तेव्हा पिशाच्चाचा आकार मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्लयुद्ध झाले.

परंतु जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येई, तेव्हा तेव्हा पिशाच्चाचा आकार आणखीनच मोठा होई आणि तो सात्यकीला जास्त जखमा करू लागे.

एका प्रहरानंतर बलराम जागे झाले. त्यांनी सात्यकीला झोपायला सांगितले.

सात्यकीने पिशाच्चाबद्दल काहीच सांगितले नाही.

बलराम पहारा देऊ लागले. पिशाच्चाने त्यांनाही मल्लयुद्धासाठी बोलावले.

बलराम क्रोधाने त्याच्यावर धावून गेले, तेव्हा पिशाच्चाचा आकार अजून मोठा झाला.

ते जितक्या रागाने लढत, तितकाच तो अधिक बलवान होत असे.

प्रहर संपला, आणि पहारा देण्याची वेळ भगवान श्रीकृष्णांची आली.

 पिशाच्चाने मोठ्या रागाने श्रीकृष्णांना बोलावले.

परंतु श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पहात राहिले.

पिशाच्च अधिकच संतापले आणि मोठमोठ्याने ओरडू लागले, पण श्रीकृष्ण मात्र शांत भाव जपत राहिले.

आश्चर्य असे झाले की, जसे जसे पिशाच्चाचा राग वाढला, तसे तसे त्याचा आकार छोटा होत गेला.

रात्र संपता संपता पिशाच्चाचा आकार इतका लहान झाला की तो शेवटी एक छोटासा किडा झाला.

श्रीकृष्णांनी तो किडा अलगद त्यांच्या उपरण्यात बांधला.

 सकाळी सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी श्रीकृष्णांना सांगितली.

तेव्हा श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखवत सांगितले:

“हे क्रोधाचे पिशाच्च होते. याला शांती हेच औषध आहे.

क्रोधाने क्रोध वाढतो, पण त्याचा प्रतिकार फक्त शांततेने होतो.

मी शांत राहिलो, म्हणून हे पिशाच्च आता किड्यासारखे लहान झाले आहे. ”

तात्पर्य:

क्रोधावर संयमानेच विजय मिळवता येतो.

क्रोधाला क्रोधाने मारता येत नाही; तो शांतपणे आणि प्रेमानेच कमी करता येतो, नष्ट करता येतो.

क्रोधाचे हे पिशाच्च बाहेर कोठे नसून, आपल्या विचारांमध्येच असते.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती: सौ.राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माहेर नसलेल्या मुली… – कवयित्री: सौ. लक्ष्मी यादव ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ माहेर नसलेल्या मुली… – कवयित्री: सौ. लक्ष्मी यादव ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

माहेर नसलेल्या मुली

कुठं जात असतील सणावाराला?

सासरी थकून गेल्यावर

चार दिवसांच्या माहेरपणाला?

 

कुणाला सांगत असतील

नवऱ्यानं झोडपल्यावर

भरलेल्या घरात

पोरकं पोरकं वाटल्यावर?

माहेर नसलेल्या मुलींचं

गाव कोणतं असेल?

 

कुठून घेत असतील त्या साडी चोळी

कुणाला बांधत असतील राखी

वडील भावाची ढाल नाही म्हणून

त्या नेहमी भिऊन राहत असतील का जगाला?

दुसऱ्यांच्या आईचा खरखरीत हात

नातवांच्या तोंडावरून मायेनं फिरताना पाहून

काळीज जळत असेल का त्यांचं?

 

माहेर नसलेली मुलगी

आपल्या लेकरांना कसं सांगत असेल

मामा- मामी आजी- आजोबा या हक्काच्या नात्यांबद्दल?

मामाच्या गावाला जायचं

गात असतील का तिचीपण मुलं?

 

आईनं दिलेल्या वानवळ्याच्या पिशव्या कोणी पोचवत असेल का त्यांना?

बापानं उष्टावून आणलेला रानातला पेरू

कधी मिळत असेल का त्यांना खायला?

 

माहेर नसलेल्या मुली

निवांत झोपू शकत असतील का कुठं

जिथून त्यांना कुणीही लवकर उठवणार नाही?

कधी घेत असतील का त्या मोकळा श्वास

फक्त त्यांचाच अधिकार असलेला?

 

माहेर नसलेल्या मुलींना

येत असतील का रोज आईचे फोन

तू बरी हाईस का विचारणारे?

कधी तिला आवडतं म्हणून घरात काही बनतं का

की ती उपाशी निजली

तरी कुणाच्या लक्षातही येत नसेल?

 

माहेर नसलेल्या मुलींचे हुंदके

विरत असतील का हवेत

कुणीही तिला उराशी न कवटाळता?

किंकाळी फोडून रडावं

अशी कूस असलेली जागा मिळते का त्यांना कधी कुठं?

 

माहेरचा आधार नाही म्हणून

माहेर नसलेल्या मुलींना

जास्तच छळत नसेल ना नवरा?

त्रास असह्य झाल्यावर

माहेरला निघून जाईन

अशी धमकी देत असतील का त्या नवऱ्याला?

घर सोडून कुठंतरी जावं या भावनेनं

हजारदा भरलेली पिशवी पुन्हा फडताळात ठेवताना

 चिंध्या होत असतील का त्यांच्या काळजाच्या?

 

माहेरची माणसं असूनही

माहेर नसलेल्या मुलींची वेदना खोल

की माहेरच्या माणसाचा मागमूसही न राहिलेल्या मुलीची जखम ओली

हे ठरवता येत नाही

 

माहेर नसलेल्या मुली

त्यांच्या लेकी-सुनांचं माहेर बनून

भरून काढत असतील का

स्वत:ला माहेर नसण्याची उणीव?

 

माहेर नसलेल्या मुलींना

आयुष्याच्या शेवटाला

कोण नेसवत असेल माहेरची साडी

की निघून जात असतील त्या

या जगातून

‘माहेर नसलेली मुलगी’

हेच नाव धारण करून?

कवयित्री : सौ. लक्ष्मी यादव  

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माझी लेक … – लेखिका: श्रीमती भारती पांडे ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ माझी लेक … – लेखिका: श्रीमती भारती पांडे ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

माझी लेक…काळी सावळी..तरतरीत

अभिमानी.

चमकत्या आत्मविश्वासपूर्ण डोळ्यांनी माझ्या नजरेला नजर देत

वाकली नमस्काराला.

मी ठरवलं होतं कधीच

डोळे मऊ होऊ द्यायचे  नाहीत

तिनं मला एक कोवळं हसू बहाल केलं…जिवणीच्या कोपर्‍यातल्या खळीसकट.

काय नव्हतं त्यात?

कुठल्या कुठल्या आठवणी..राग लोभ ..रुसवेफुगवे

तान्हेपण तिचं आणि नवखं आईपण माझं.

चढता ताप तिच्या कोवळ्या शरीराला

आणि माझ्या कासावीस मनाला.

भांडण आम्हा मोठ्यांचं आणि

चेहरा उतरलेला बाळीचा

यशपराक्रम तिचा आणि

अभिमान प्रतिबिंबित माझ्या मनात

आणखीही बरंच काही काही

त्या नजरेत..त्या हसण्यात.

 

तेवढ्यात तिच्या मामानं

तिच्या ताठ पाठीवर हलका हात टेकत गदगदत म्हटलं, चल बाळ

परत एक खोल नजर माझ्या नजरेत

रुतवून ती वळली.

ती आता जी आहे आणि मी आता जी आहे

याबद्दलचं ऋणच जणू आम्ही दोघी स्वीकारत होतो.

फक्त आता तिच्या जिवणीवरचं फुलपाखरू उडून गेलं होतं

नुसती तिथली खळी थरथरत होती.

तिच्या डौलदार पाठमोऱ्या आकृतीकडे पहाता पहाता मी

एकदम अनोळखीच होऊन गेले.

कुण्या परक्या हातानं तिचा शेला सावरला.

आणखी कुणी तिच्या हातात एक भरगच्च हार दिला.

ही तर माझी कुणीच नव्हती

ही एक अनोळखी नवरी मुलगी..

मला क्षणभर वाटलं.

दारातल्या तोरणाखालीच

क्षणभर थबकत तिनं झटकन

मागे वळून पाहिलं.

चमकणारे डोळे आता मोत्यांनी लगडले होते.

थोडं भय थोडी उत्कंठा थोडी उत्सुकता आणि

पाठीशी हवी असलेली

आश्वासक नजर माझी.

 

पुन्हा नजर फिरवून ती

मंडपाकडे चालायला लागली

माझ्या छातीत पोटात डोळ्यात गळ्यात एक जीवघेणी कळ उठली

आज

दुसर्‍यांदा नाळ तुटत होती.

आज

दुसर्‍यांदा नाळ तुटत होती.

लेखिका: श्रीमती भारती पांडे.

प्रस्तुती :  श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कशास मागू देवाला…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “कशास मागू देवाला” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

क्षणो क्षणी तो देतो मजला,

श्वासामागुनी श्वास नवे..

कशास मागू देवाला,

मज हेच हवे, अन् तेच हवे?

 *

क्षितिजावरती तेज रवीचे,

रोज ओततो प्राण नवे..

उजळविती बघ यामिनीस त्या,

नक्षत्रांचे लक्ष दिवे..

निळ्या नभावर रांगोळीसम

उडती चंचल पक्षी-थवे..

कशास मागू देवाला,

मज हेच हवे, अन् तेच हवे?

 *

वेलींवरती फुले उमलती,

रोज लेऊनी रंग नवे..

वृक्ष बहरती, फळे लगडती,

 गंध घेऊनी नवे नवे..

हरिततृणांच्या गालिच्यावर,

दवबिंदूंचे हास्य नवे..

कशास मागू देवाला,

मज हेच हवे, अन् तेच हवे?

 *

प्रसन्न होऊनी निद्रादेवी,

स्वप्न रंगवी नवे नवे,

डोळ्यांमधली जाग देतसे,

नव दिवसाचे भान नवे,

अमृत भरल्या जीवनातले,

मनी उगवती भाव नवे,

कशास मागू देवाला,

मज हेच हवे अन् तेच हवे?

 *

कोणी आप्त तर कोणी परका,

उगा निरर्थक मन धावे..

सखा जिवाचा तोच, हरी रे,

नाम तयाचे नित घ्यावे..

नको अपेक्षा, नकोच चिंता,

स्वानंदाचे सूत्र नवे..

कशास मागू देवाला,

मज हेच हवे, अन् तेच हवे?

कवी : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares