मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ फक्त प्रेम करा! ☆ सुश्री सुनीता पाटणकर

सौ. सुनीता पाटणकर

? वाचताना वेचलेले ?

☆ फक्त प्रेम करा! ☆ सुश्री सुनीता पाटणकर ☆

सख्खा भाऊ, सख्खी बहीण, सख्खी मैत्रीण, सख्खे काका, सख्खी काकू, सख्खी मावशी 

नेमकं काय असतं हे “सख्ख प्रकरण?” —–

 

सख्खा म्हणजे आपला सखा.

सखा म्हणजे जवळचा——जवळचा म्हणजे ज्याला आपण कधीही, केव्हाही, काहीही सांगू शकतो. 

त्याला आपलं म्हणावं,— त्याला सख्ख म्हणावं !

 

सध्याच्या कलियुगात, आपण काय करतोय हे सख्ख्या नातेवाईकांच्या कानावर पण पडता कामा नये इतकी खबरदारी घेतली जाते, तिथे सख्ख्य  नसते पथ्य असते.

 

ज्याच्या जवळ आपण मनातलं सारं काही सांगू शकतो, मोठ्ठ्याने हसू शकतो किंवा  काळजातलं दुःख सांगून स्फुंदून स्फुंदून रडूही शकतो त्याला सख्ख म्हणावं, त्याला आपलं म्हणावं !

 

ज्याच्याकडे गेल्यानंतर आपलं स्वागत होणारच असतं 

आपल्याला पाहून त्याला हसू येणारच असतं

अपमानाची तर गोष्टच नसते— फोन करून का आला नाहीस अशी तक्रारही नसते !

 

पंढरपूरला गेल्यावर विठ्ठल म्हणतो का —-

“ या या फार बरं झालं !” 

 

माहूरवरून रेणुका मातेचा, किंवा कोल्हापूरवरून महालक्ष्मीचा, किंवा तिरुपतीहून गिरी बालाजीचा आपल्याला काही Whatsapp call आलेला असतो का ?’ या ‘ म्हणून !

मग आपण का जातो ?— कारण भक्ती असते, शक्ती मिळते आणि संकटमुक्तीची आशा वाटते —-म्हणून ! – हा ही एक प्रकारचा ” आपलेपणाच !”

 

लौकिक अर्थाने, वस्तूच्या स्वरूपात देव आपल्याला कुठे काय देतो ? 

किंवा आपण नेलेले तो काय घेतो ? —काहीच नाही.

 

रुक्मिणी काय पाठीवरून हात फिरवून म्हणते का, 

“ किती जाड  झालीस ?  कशी आहेस ? सुकलेला दिसतोस, काय झालं ? “ 

—-नाही म्हणत.

मग दर्शन घेऊन निघतांना वाईट का वाटतं ?– पुन्हा एकदा मागे वळून का पहावं वाटतं ?

प्रेम, माया, आपुलकी, विश्वास, म्हणजेच ” आपलेपणा !”

 

हा आपलेपणा काय असतो ?—–

आपलेपणा म्हणजे भेटण्याची ओढ— भेटल्यानंतर बोलण्याची ओढ –-

बोलल्यानंतर ऐकण्याची ओढ—- आणि निरोप घेण्याआधीच— 

पुन्हा भेटण्याची ओढ !

 

ज्याला न बोलताही आपलं दुःख कळतं,  त्याला आपलं म्हणावं– 

आणि चुलत, मावस असलं, तरी सख्ख म्हणावं !

 

मी त्याचा आहे आणि तो माझा आहे ही भावना दोघांच्याही मनात सारखीच असणे …..

म्हणजे  ” आपलेपणा ! “

 

एक शब्दही न बोलता ज्याला पाहिल्या पाहिल्या डोळे भरून येतात,  आणि निःसंकोचपणे गालावरून ओघळू लागतात— 

तो आपला असतो —  ” तो सख्खा असतो !”

 

लक्षात ठेवा,

 

ज्याला दुसऱ्यासाठी “सख्ख” होता येतं, त्यालाच कुणीतरी सख्ख असतं. 

बाकी फक्त परिचितांची यादी असते —-

नको असलेल्या माणसांची गर्दी असते !—-

 

तुम्हीच सांगा—–

फक्त आईची कूस एक आहे म्हणून सख्ख म्हणायचं का ?—-

ज्याला तुमच्या दुःखाची जाणीवच नाही त्याला सख्ख म्हणायचं का ?—- 

 

आता एक काम करा —–

करा यादी तुम्हाला असणाऱ्या सख्ख्या नातेवाईकांची—- 

झालं नं मनात धस्स—- 

व्हायला लागली ना छातीत धडधड —-

नको वाटतंय न यादी करायला —-

रडू नका, पुसून टाका डोळ्यातलं पाणी— 

आणि मानायला लागा सर्वांना आपलं—- कोणी कितीही झिडकारलं तरी— 

कारण —–

राग राग आणि तिरस्कार करून काहीच हाती लागत नाही —-

जग फक्त प्रेमानेच जिंकता येतं —–

 

म्हणून फक्त प्रेम करा !!  फक्त प्रेम करा !!.

 

संग्राहिका : – सौ. सुनीता पाटणकर

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रिय “ प “ — ☆ संग्रहिका – सौ. अंजली दिलीप गोखले

सौ. अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

प्रिय “ प “ — ☆ संग्रहिका – सौ. अंजली दिलीप गोखले ☆

“प” माणसाला खूप प्रिय आहे,आपण जीवनभर या “प” मागे धावत असतो

जे मिळते तेही या “प” पासून आणि जे मिळत नाही तेही या “प” पासून

              प    पति

              प    पत्नि

              प    पुत्र

              प    पुत्री

              प    परिवार

              प  प्रेम

              प   पैसा

              प   पद 

              प प्रतिष्ठा

              प प्रशंसा

              प प्यार

              प पार्टी

              प परीक्षा

              प पब्लिसिटी

           

ह्या “प” मागे लागून लागूनच आपण “प” पासून पाप करत राहतो

आणि मग आपले “प” पासून पतन होते…

आणि शेवटी शिल्लक राहते फक्त  “प” पासून पश्चात्ताप…

पापाच्या  “प” मागे लागण्यापेक्षा सर्वात चांगले आपण  “प” पासून परमेश्वर च्या मागे लागावे आणि  “प” पासून पुण्य कमवावे 

शेवटी  “प” पासून प्रणाम—–

संग्राहक : – सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ विसर्जन…सुभाष अवचट ☆ संग्राहिका – सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ विसर्जन…सुभाष अवचट ☆ संग्राहिका – सुश्री प्रभा हर्षे ☆

कुठे, केव्हा, कसे थांबावे ही एक कला आहे. ती सर्व कलांमध्ये लागू होते. कविता, कथा, कादंबरी, चित्र, शिल्पात, कुठे थांबायचे याला संयम आणि विवेक लागतो. अन्यथा आशय भरकटत जातो. तसे जीवनातही घडते. माझ्याभोवती तरुणपणी अलौकिक माणसे होती. त्यांच्यामुळेच ही जाणीव मला होत गेली. विंदा करंदीकर माझे शेजारी आणि प्रतिभावंत कवी. एकदा त्यांनी ठणकावले की, आता मी लिखाण बंद करतो आहे. आणि त्यांनी शब्द पाळला. स्वत:शी प्रामाणिक राहून या निर्णयापर्यंत यावयास धारिष्टय़ तर लागतेच; पण विसर्जनाची बूजही लागते. तसेच तात्या माडगूळकरही होते. तेही माझे मित्र होते. आयुष्याच्या उताराला लागले तेव्हा या उमद्या लेखक, चित्रकार, शिकारी आणि प्रवासी माणसाने हाच मार्ग अवलंबला. ते म्हणायचे, ‘‘गडय़ा, जगण्याची आतून उमेद राहिली नाही.’’ विंदा शेवटपर्यंत प्रसन्न राहिले. भाजी, मासे आणायला आम्ही सोबतीने जात असू. मासेवाल्या बाईशी घासाघीस करायला त्यांना मजा येत असे. तेव्हा त्यांच्यातला कवी बहुदा त्यांच्या पिशवीत त्यांनी लपवून ठेवलेला असे. तितक्याच आत्मीयतेने ते संगीतात रमत. तसेच तात्या होते. संध्याकाळी आम्ही गप्पा मारीत फेरफटका मारीत असू. तेव्हा त्यांच्यातल्या अद्भुत लेखकाची सावली कुठेही त्यांच्याबरोबर चालत नसे. उरलेले जीवन एखाद्या कवितेसारखे गुणगुणत ही माणसे कुठलेही आविर्भाव न घेता जगले. पु. ल. देशपांडय़ांनीही वेळेनुसार आवराआवर केली. देणग्या देऊन, पुस्तके/ पुस्तकांचे हक्क त्यांनी वाटून टाकून ते मुक्त झाले आणि उरलेले आयुष्य एक गिफ्ट मिळाल्यासारखे हसत जगले.

‘‘जोपर्यंत लोकांना वाटते आपण अजून खेळावे, तीच थांबण्याची योग्य वेळ असते..’’ हे सुनील गावस्करचे वाक्य तंतोतंत यात बसते. कोठे थांबावे हाच संयम त्यात आहे.

विद्वान तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणजे आमचे आबा. त्यांचा व्यासंग, प्रभुत्व, त्यांची जाण, अभ्यास, समाज सुधारण्यासाठीचे त्यांचे दीर्घ कार्य सर्वांनाच ठाऊक आहे. त्यांच्या सहवासात मला हेच जाणवते. या प्रचंड ज्ञानाच्या ग्रंथसंग्रहालयातून ते अचानक जुन्या महाबळेश्वरच्या घरी गेले. ड्रायव्हरला सांगितले, ‘‘सकाळी काही घाई नाही.’’ ड्रायव्हर जेव्हा आत आला तेव्हा छातीवर हात ठेवून आबांचे विसर्जन झाले होते. ज्ञानी आणि भक्कम जीवनाचा अर्थ कळलेले हे ऋषीच म्हणावे लागतील. साहित्य सहवासात संध्याकाळी फिरताना गंगाधर गाडगीळ एकदा भेटले. गाडगीळ हे ब्रिटिश शिस्तीतले होते. सगळं नीटनेटके, वेळेवर असायचे- जसे त्यांचे वाङ्मय आणि आयुष्य होते. त्या संध्याकाळी त्यांचा ड्रेसदेखील इस्त्री केलेला, तंतोतंत होता. त्यांच्या मदतीला बरोबर नोकरही होता. मला त्यांनी थांबवले आणि म्हणाले, ‘‘मिस्टर अवचट, बरे झाले आत्ताच भेट झाली ! आता पुढे भेट शक्य नाही.’’

‘‘परदेशी चाललाय का?’’ मी विचारले.

‘‘नाही. आत्ता सारे थांबवले आहे. लिखाण आणि इतर गोष्टी व्यवस्थित आवरल्या आहेत. औषधे बंद केली आहेत. आता एकेक मित्रांना भेटतो आहे. थँक्यू, तुमचा सहवास लाभला.’’ ते शांतपणे नोकराबरोबर फाटकापाशी चालत गेले. त्याच आठवडय़ात ते गेल्याचा निरोप आला. या लोकांनी हे विसर्जन किती समजूतदार आणि अलिप्तपणे स्वीकारले होते.

ओशोंनीही अत्यंत वेगळ्या संदर्भाने विसर्जनावर लिहिले आहे. Abandoning  करणे, सोडून देणे अशी सारी अंगे या विसर्जनात येतात. ओशोंनी शेवटी सांगितले, ‘‘ माझ्या गळ्यात घातलेल्या माळा फेकून द्या. संन्याशी भगवे कपडे काढून टाका. स्वत:चा संन्यास स्वत: शोधा. जे मौनात विसर्जित होते तेच चांगले संगीत !’’ त्यांच्या या वाक्यातच जीवनाच्या संगीताचे अर्थ सामावले आहेत. जगण्याच्या या शर्यतीत प्रत्येक जण निराळे मार्ग शोधतो. बहुतेकांना ते आयते हवे असतात. कोणाच्या तरी खांद्याची, दैवताची डोके ठेवण्याची त्यांची गरज असते. पण विसर्जन हा तुमच्या बौद्धिक पातळीचा, मनाचा एक भाग आतल्या आत असतो; जो भाग एखादा गुरू, प्रसाद म्हणून तुमच्या हातात देत नाही.

वयाप्रमाणे जीवनाशी सामील होणे यातच खरी ग्रेस आहे. अंगणात उन्हात तांदूळ निवडत बसलेल्या, साईसारखी त्वचा झालेल्या प्रेमळ आजीमध्ये ती ग्रेस असते.

कोऱ्या हॅण्डमेड पेपरवर रंगाचा पहिला ठिपका टाकल्यावर तो हळुवार पसरत जातो. पुन्हा अनेक रंगांत तो मिसळत जातो. त्याच्या कंट्रोल्ड ओघळांनी किंवा छटांनी एक चित्र बनते. कधी ते देखणे दिसते, कधी जमत नाही. हे महत्त्वाचे नाही. ती प्रोसेसच दैवी असते. त्या कागदावरच्या रंगाच्या प्रत्येक ठिपक्यात पारदर्शक विसर्जनाचे क्षण तरंगत असतात.. बदलत राहतात. विघटन हे अलौकिक अ‍ॅबस्ट्रॅक्ट नॅचरल चराचरातील मौनच असते.

‘समतया वसुवृष्टि विसर्जनै:’—–

जंगलात, ऋतुचक्रात हे सामावलेले असते. हत्तीला कळते आपले दिवस संपायला आलेत. कळपातून तो अपरात्री गुपचूप पाय न वाजवता निघतो आणि पूर्वीच शोधलेल्या गुप्त ठिकाणाकडे तो चालत राहतो. तो तेथे पोहोचतो आणि स्थिर उभा राहतो. त्याचा एवढा प्रचंड बलवान देह हळूहळू काही दिवसांत संपतो आणि मातीशी एकरूप होतो.. हे विसर्जन !

झाडाचे पिकले पिवळे पान फांदीवरून निसटते. हवेत तरंगत मौनाच्या प्रार्थनेसारखे जमिनीवर अलगद टेकते आणि विसर्जित होते. अगदी हळुवारपणे. विसर्जन ही मौलिक गिफ्ट आहे.

लेखक : – सुभाष अवचट 

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे

भ्रमणध्वनी:-  9860006595

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆  विमोह त्यागून कर्मफलाचा… – कवी मनोहर कवीश्वर ☆ संग्राहक – सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ अविमोह त्यागून कर्मफलाचा… – कवी मनोहर कवीश्वर  ⭐ संग्राहक – सौ.शशी.नाडकर्णी-नाईक ⭐

  सुधीर फडके यांनी गायलेले खालील अजरामर गीत म्हणजे भगवद्गीतेचा परिपाकच !

    — कवी मनोहर कवीश्वर यांनी लिहिलेल्या आणि बाबूजींनी गायलेल्या एका गाण्यात जणू गीतेचे सार एकवटून आले आहे. गीता जयंतीनिमित्त त्या गाण्याची उजळणी करूया

युद्धभूमीवर अर्जुनाची जी अवस्था झाली, ती अवस्था तुमची, आमची, सर्वांची रोजच होत असते. आपले म्हणवणारे लोक आपल्या विरुद्ध जाऊन बंड पुकारतात, तेव्हा आपले जीवन कुरुक्षेत्राप्रमाणे भासू लागते. मात्र, आपली एवढी पुण्याई नाही, की भगवान श्रीकृष्ण आपले मनोबल वाढवण्यासाठी आपल्या समोर प्रगट होतील. यासाठीच भगवंतांनी अर्जुनासकट सर्व मानवजातीला उद्देशून जे तत्त्वज्ञान सांगितले, ते म्हणजेच भगवद्गीता. भगवंतांनी गीता गायली, तो दिवस गीता जयंती म्हणून ओळखला जाऊ लागला. यापूर्वी आपल्याकडून गीतेचे पठण, चिंतन झाले नसेल, तर गीता जयंतीच्या मुहूर्तावर हे गीता पठणास सुरुवात करावी. 

आपल्या आयुष्यातील सर्व प्रश्नांची तात्विक उत्तरे गीतेत सापडतात. फक्त ती डोळसपणे शोधता आली पाहिजेत. समजवून घेता आली पाहिजेत . प्रत्यक्ष गीता समजली नाही, तर गीतेतील अनुवाद वाचावा, भावार्थ वाचावा. येनकेनप्रकारेण भगवद्गीतेतील बोध आपल्या आयुष्यात अंगीकारण्याचा प्रयत्न करावा. असाच एक प्रयत्न कवी मनोहर कवीश्वर यांनी एका गाण्यात केला आहे. त्या गाण्यात, जणू काही गीतेचे सार एकवटून आले आहे. गीता जयंतीनिमित्त त्या गाण्याची उजळणी करूया.

विमोह त्यागून कर्मफलांचा, सिद्ध होई पार्था,

कर्तव्याने घडतो माणूस, जाणून पुरुषार्था।

भगवान श्रीकृष्ण पार्थाची अर्थात अर्जुनाची समजूत घालतात, नात्यांचा मोह त्यागून ज्या कार्यार्थ युद्धभूमीवर आला आहेस, ते कार्य अर्थात धर्मयुद्ध करण्यासाठी सज्ज हो. या कर्तव्यापासून दूर पळू नकोस. ज्यांना आपले म्हणवतोस, त्यांनीही तुला आपले समजले असते, तर ते आज तुझ्याविरूद्ध युद्धासाठी सरसावले नसते. तू ही तुझे कर्तव्य ओळख आणि शस्त्र हाती घे.

शस्त्रत्याग तव शत्रूपुढती नच शोभे तुजला,

कातर होसी समरी मग तू, विरोत्तम कसला,

घे शस्त्राते सुधीर होऊन, रक्षाया धर्मार्था।

तू क्षत्रिय आहेस. युद्धभूमीवर पाठ फिरवून जाणे तुला शोभणार नाही. युद्धाच्या क्षणी तू भयभीत झालास, तर तुला कोणीही विरोत्तम म्हणणार नाही. हे युद्ध तुझ्या एकट्याचे नाही, तर धर्मरक्षणार्थ आहे. तुला धीर एकवटून आलेल्या प्रसंगाला तोंड दिलेच पाहिजे.

कर्तव्याच्या पुण्यपथावर मोहांच्या फुलबागा,

मोही फसता मुकशिल वीरा मुक्तीच्या मार्गा,

इहपरलोकी अशांतीने तव विक्रम झुकविल माथा।

जेव्हा कर्तव्याची वेळ येते, तेव्हा कर्तव्यापासून परावृत्त करणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या आड येत राहतात. त्या मोहाच्या क्षणांना बळी न पडता आपण आपले काम चोख बजावायचे असते. तसे झाले नाही, तर तू भरकटत जाशील. ध्येयापासून परावृत्त झाल्यावर तुझ्या जगण्याला अर्थ उरणार नाही आणि ती सल आयुष्यभर तुला जगू देणार नाही.

कुणी आप्त ना कुणी सखा ना,जगती जिवांचा,

क्षणभंगूर ही संसृती आहे, खेळ ईश्वराचा,

भाग्य चालते कर्मपदांनी, जाण खऱ्या वेदार्था।

आपले आपले म्हणवणारे लोकच आपल्या पाठीत खंजीर खुपसतात. स्वत:च्या सावलीवरही विश्वास ठेवू नका. तीदेखील अंधारात आपली साथ सोडून जाते, मग इतरांकडून काय अपेक्षा ठेवणार? जोवर सगळे छान, सुरळीत सुरू आहे, तोवरच ही नाती आहेत, कठीण काळ येता, कोणीही कोणाला विचारत नाही. हा कठीण काळ नात्यांचा खरा परिचय करून देतो. म्हणून त्यांच्यावर विसंबून न राहता, तू तुझे कर्म प्रामाणिकपणे करत राहा आणि तुझ्या हातांनी तुझे आयुष्य घडव.

रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो,

कौरवात मी, पांडवात मी, अणुरेणुत भरलो,

मीच घडवितो, मीच मोडितो, उमज आता परमार्था।

चांगले-वाईट प्रसंग हाताळण्यासाठी तू समर्थ आहेस. दुसरे कोणी किंवा साक्षात परमेश्वर माझ्या मदतीला येईल याची वाट बघत बसू नकोस. मला शोधण्यात वेळ दवडू नकोस. मी अणुरेणुत सामावलो आहे. तुुझे कर्म योग्य असेल, तर मी कायम तुझ्या सोबत असेन. यशाने हुरळून जाऊ नकोस किंवा अपयशाने खचून जाऊ नकोस. ही सर्व माया मीच निर्माण केली आहे. त्यात न अडकता, तुला कर्तव्यनिष्ठ राहायचे आहे, हे लक्षात ठेव.

कर्मफलाते अर्पुन मजलासोड अहंता वृथा,

सर्व धर्म परि त्यज्युन येई शरण मला भारता,

कर्तव्याची साद तुझ्या तुज सिद्ध करी धर्मार्था।

*तुझे प्रत्येक कर्म भगवंताला साक्षी ठेवून कर. फळ काय मिळेल, याचा विचार न करता, तुझे कर्म करत राहा. केलेल्या कर्माचा वृथा अभिमान बाळगू नकोस. तू एक माध्यम आहेस. कर्ता करविता परमेश्वर आहे, हे कायम लक्षात ठेव, म्हणजे तुला अहंकाराची बाधा होणार नाही आणि अहंकाराचा वारा लागला नाही, तरच तू तुझ्या कर्तव्याबाबत जागरूक राहशील.

 

कवी: – मनोहर कवीश्वर

प्रस्तुती :-:ज्योत्स्ना गाडगीळ

संग्राहिका :– सौ शशी नाडकर्णी नाईक

फोन  नं. 8425933533

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत. ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆ 

(एक बोधकथा)

इटलीमधील व्हेनिस शहरातील एका कॉफी शॉपमध्ये मी मित्रांसोबत बसलेलो होतो.आम्ही गप्पा आणि कॉफीचा आस्वाद घेत होतो. तेवढ्यात एक माणूस आला आणि आमच्यासमोरील टेबलवर बसला. त्याने वेटरला बोलवले आणि ऑर्डर दिली.” दोन कॉफी….एक माझ्यासाठी आणि एक त्या भिंतीसाठी !”

माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. मी त्या व्यक्तीकडे पाहू लागलो. वेटरने त्याला एकच कॉफी आणून दिली. बिल मात्र दोन कॉफीचे होते. त्या व्यक्तीने दोन कॉफीचे बिल दिले आणि तो निघून गेला. लगेच वेटरने एक चिठ्ठी भिंतीवर चिटकवली आणि ओरडला, ‘ एक कॉफी ऑफ कप.’

आम्ही तिथेच गप्पा मारत बसलो. तेवढ्यात आणखी दोघेजण तिथे आले. त्यातील एकाने तीन कॉफीची ऑर्डर दिली. दोघांनी एक-एक कॉफी घेऊन तीन कॉफीचे पैसे दिले. मग पुन्हा वेटरने काहीतरी लिहिलेला कागदाचा एक तुकडा तिथे चिटकवला आणि पुन्हा तेच ओरडला. आमच्यासाठी हे एक नवलच होते. आम्ही कॉफी संपवली आणि बिल देऊन बाहेर पडलो.

काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा त्याच कॉफी शॉपमध्ये जाण्याचा योग आला. आम्ही कॉफीचा स्वाद घेत असतानाच एक गरीब दिसणारी व्यक्ती आली आणि समोरील टेबलावर बसली. त्या व्यक्तीने वेटरला सांगितले की,”  वन कप ऑफ कॉफी फ्रॉम द वॉल.”

त्या वेटरने नेहमीच्याच अदबीने त्या व्यक्तीला कॉफी दिली. त्या व्यक्तीने कॉफीचा आस्वाद घेतला आणि बिल न देताच ती व्यक्ती निघून गेली.

हे सगळे पाहून आम्ही आश्चर्यचकीत झालो होतो. तेवढ्यात त्या वेटरने भिंतीवर चिटकवलेला कागदाचा तुकडा काढून डस्टबिनमध्ये टाकून दिला. या शहरातील गरीबांनाही कॉफीचा आस्वाद घेता यावा यासाठी कुणीतरी काळजी घेणारे होते. ती काळजी अतिशय आदराने आणि कुणालाही कळणार नाही अशा पद्धतीने घेतली जात होती. त्या गरीबाच्या प्रतिष्ठेला कुठेही धक्का लागणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती.

नकळत आमचे डोळे पाणवले. कारण ज्या गरिबाला कॉफी प्यावीशी वाटली होती, तो खिशात पैसे नसतांनाही आला होता. त्याला कुणाकडेही हात पसरावे लागले नाहीत, किंवा कुणाकडेही याचना करण्याची वेळ आली नाही. एवढेच काय, हे दान कुणी दिले याचीही त्याला कल्पना नव्हती. त्याचवेळी देणाऱ्यालाही आपले दान कुणाला जाणार याची कल्पना नसते; पण त्याला नक्की ठाऊक असते की हे सत्पात्री दान आहे.

—–खरंच बोध घेण्यासारखी कथा. 

प्रस्तुती : श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मी मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या – भाग-2 – प्रज्ञावंत देवळेकर ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ मी मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या – भाग-2 – प्रज्ञावंत देवळेकर ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

(त्यांनी धरणाच्या भिंतीजवळ विहिरीसदृश्य गोलाकार संरचना केली आणि त्यांना स्वयंचलित दरवाज्यांशी जोडलं आणि दरवाजे धरणाच्या भितींच्या आत बसवले..)

इथून पुढे —-

यातल्या १७१ दरवाज्यांपैकी ४८ लोखंडी दरवाजे भद्रावतीच्या पोलाद कारखान्यात बनवले होते.  आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रत्येक दरवाज्यावर दहा टनांचा भार असूनही ते स्वत: वर खाली होऊ शकत होते..

जेव्हा जलाशयात पाण्याची पातळी वाढायची, तेव्हा पाणी विहिरीत पडायचं, ज्यामुळं विहिरीची पातळी वाढून स्वयंचलित दरवाजे आपोआप उघडून जायचे आणि अतिरिक्त पाणी निघून जायचं अन् विहिरीची पातळी जशी कमी व्हायची तसे दरवाजे आपोआप बंद होऊन पाण्याचा प्रवाह थांबत होता..

संपूर्ण जगभरात असं अभिनव तंत्र पहिल्यांदाच वापरलं जात होतं.  याची नंतर युरोपासह इतर अन्य देशात काॅपी झाली..

‘ धरणाची उंची न वाढवता त्याची जलक्षमता वाढवणं ’ ही कल्पना कुणाच्या स्वप्नात देखील आली नसेल पण विश्वेश्वरैय्यांनी ते करून दाखवलं– ते ही इथं पुण्यातल्या खडकवासल्यात..

‘मुठा’ नदीच्या पुराला नियंत्रित करण्यासाठी त्यांनी खडकवासला धरणावर पहिल्यांदाच स्वयंचलित दरवाज्यांचा प्रयोग केला होता..या प्रयोगाचं त्यांनी पेटंटही घेतलं होतं..

धरण निर्मितीसोबतच विश्वेश्वरैय्यांनी देशाच्या औद्योगिक विकासातही भरीव असं योगदान दिलं..

धरण आलं तशी वीज आली– आणि जशी वीज आली तसे उद्योगधंदे बहरू लागले..

औद्योगिकीकरणाचे खंदे समर्थक असल्यानं त्यांनी बंगलोर इथं “ भारतीय विज्ञान संस्थान “ या ठिकाणी धातूकाम विभाग–वैमानिकी–औद्योगिक वहन आणि अभियांत्रिकी, अश्या अनेक विभागांची पायाभरणी केली..

औद्योगिकीकरणास त्यांचा फक्त ढोबळ पाठिंबा नव्हता.  यामागं देशांतर्गत अशिक्षितपणा-गरीबी-बेरोजगारी-अनारोग्य याबाबत मूलभूत असं चिंतन होतं..

उद्याेगधंद्यांचा अभाव–सिंचनासाठी मान्सूनवरची अवलंबिता–पारंपरिक कृषी पद्धती–प्रयोगांची कमतरता– यामुळं विकासात येणारा अडथळा रोखण्यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम करत आपल्या कार्यकाळात म्हैसूर राज्यातल्या शाळांची संख्या ४५०० वरून १०,५०० पर्यंत नेली.  फलस्वरुप विद्यार्थ्यांची संख्या १,४०,००० वरून ३,६६,००० पर्यंत वाढली..

मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृहासोबतच पहिलं फर्स्ट ग्रेड काॅलेज सुरू करण्याचं श्रेयही त्यांचंच..

सोबत म्हैसूर विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता..

हुशार मुलांना परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, शेतकी–अभियांत्रिकी–औद्योगिक प्रशिक्षणासाठी महाविद्यालये, यासाठी त्यांनी दूरगामी नियोजन केलं..

“ उद्योगंधदे म्हणजे देशाची जीवनरेखा “ असं मानत त्यांनी रेशम-चंदन-धातू-स्टील– अश्या उद्योगांना जर्मन आणि इटालियन तंत्रज्ञांच्या मदतीनं विकसित केलं..

त्यांची धडपड आणि आशावाद निव्वळ स्वप्नाळू होता असं नाही.  तर ‘फंड’ हे वास्तव ध्यानात घेऊन त्यांनी बॅंक ऑफ म्हैसूरची मुहूर्तमेढ रोवली..

तब्बल ४४ वर्षे सक्रिय सेवा देऊन १९१८साली विश्वेश्वरैय्या लौकिकार्थानं निवृत्त झाले, तरी त्यांनी समाजजीवनातलं आपलं काम सोडलं नाही.  किंबहुना अडीअडचणीला भारतीय अभियंत्यांना प्रशिक्षित करून अनेक बंद पडलेली कामं मार्गी लावली..

म्हैसूरमध्ये ऑटोमोबाईल आणि एअरक्राफ्ट फॅक्टरीचं स्वप्न बघत त्यांनी एचएएल आणि प्रिमिअर ऑटोमोबाईलचं बीज पेरलं आणि निवृत्तीनंतरही बख्खळ काम करून ठेवलं..

आपल्या आयुष्यात असंख्य बहुमानांनी सन्मानित झालेल्या त्यांना १९५५ साली वयाच्या ९५व्या वर्षी जेव्हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न’ जाहीर झाला तेव्हा त्यांनी तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरूंना एक पत्र लिहिलं,– ” मला या उपाधीनं सन्मानित केलं म्हणून मी तुमचं कौतुक करेन अशी अपेक्षा तुम्ही बाळगलीत, तर तुमच्या पदरी निराशा पडेल..मी सत्यांच्या मुळाशी जाणारा माणूस आहे ”

नेहरूंनी त्यांच्या या पत्राची प्रशंसा करत त्यांना “ राष्ट्रीय घडामोडींवर बोलणं–शासकीय धोरणांवर टीका करण्याचं स्वातंत्र्य नेहमी अबाधित असेल..पुरस्कृत करणं म्हणजे शांत बसवणं नव्हे ”—

असं उत्तर दिलं..

वयाची शंभरी उलटल्यानंतरही विश्वेशरैय्या कार्यमग्न राहिले आणि १४ एप्रिल १९६२ या दिवशी रुढार्थानं हे जग कायमचे सोडून गेले असले, तरी इतिहासात त्यांचं नाव कायमचं कोरलं गेलं..

विश्वेश्वरैय्या हे ना जन्मानं महान होते,ना त्यांना कुठला दैदिप्यमान वारसा होता,ना हे महात्म्य त्यांचावर कुणी थोपवलं होतं..

कठीण परिश्रम–ज्ञानपिपासु वृत्ती–अथक प्रयत्न–समाजाभिमुख वर्तन,- यामुळं त्यांना हे ‘महात्म्य’ प्राप्त झालं होतं..

प्रचंड बुद्धिमान अभियंता आणि तितकेच कुशल प्रशासक असणाऱ्या विश्वेश्वरैय्यांचा जन्मदिन..

त्यांच्या सन्मानार्थ “ अभियंता दिन “ म्हणूनही साजरा केला जातो..

या ऋषितुल्य व्यक्तित्वाला विनम्र अभिवादन

समाप्त 

— प्रज्ञावंत देवळेकर 

संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर

मो. 9822363911

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मी मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या – भाग-1 – प्रज्ञावंत देवळेकर ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ मी मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या – भाग-1 – प्रज्ञावंत देवळेकर ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

गोष्ट आहे इथली भारतातलीच जेव्हा इथं इंग्रजांचं राज्य होतं..

कुठल्यातरी लोहमार्गावर प्रवाश्यांनी खच्चून भरलेली रेल्वे चालली होती आणि प्रवाशांत काही मोजक्या भारतीयांसोबत बरेचसे इंग्रज मंडळीही होते..

त्या रेल्वेच्या एका डब्यात साध्या पोशाखातला एक सावळासा शिडशिडीत तरुण प्रवासी शांतपणं खिडकीबाहेरचा निसर्ग न्याहाळत होता..

त्या तरुणाचं रंगरूप आणि कपडे बघून त्याला अडाणी समजणारे काही इंग्रज प्रवासी आपसात कुजबूज करत हसत होते..

‘आपल्यालाच हसतायेत’ हे ठाऊक असूनही तो साधा सावळा तरुण त्यांचाकडं लक्ष्य न देता आपल्याच विचारात दंग होता आणि हे बघून त्याच्याबद्दल कुजबूज करणारे जास्तच हसत होते..तेवढ्यात ‘त्या’ तरुणानं अचानक उभं रहात रेल्वेची साखळी खेचली..

एव्हाना रेल्वेनं वेग पकडला होता पण या तरुणानं साखळी ओढल्यानं रेल्वे अचानक थांबली..

‘ हा आपली तक्रार करतो की काय? याला इथं उतरायचं तर नसेल? वेडा तर नाही?’ सहप्रवाश्यांच्या मनात एक ना अनेक शंका डोकावल्या..

काहींनी तर त्याला बावळट,मूर्ख म्हणत शिव्याही घातल्या..

तेवढ्यात डब्यात गार्ड आला आणि त्यानं अंमळ रागातच विचारलं,” कुणी आणि का साखळी खेचली रे ?” 

साखळी खेचणारा साधासा तो तरुण पुढं आला– ‘ मी खेचली.’ त्याचं हे उत्तर ऐकून गार्डनं त्याला खालून वर न्याहाळलं आणि काही बोलणार तोच तरुण पुढं सांगू लागला,” मला वाटतं इथून साधारण काही फर्लांग अंतरावर रेल्वेचा रूळ तुटलाय.”

“ॲंऽऽ तुला इथूनच कसं कळलं बुवा? ” गार्ड अद्यापही रागातच होता..

“ महोदय..गाडीच्या नैसर्गिक वेगात थोडा फरक पडलाय आणि रुळांतून येणारा आवाजही मला काहीसा बदलल्यासारखा वाटतोय..ही धोक्याची घंटा आहे..”

“अच्छा एवढी हुशारी? चल बघूनच घेऊ”– म्हणत गार्ड त्या तरुणाला घेऊन डब्यातून खाली उतरला..

फर्लांगभर अंतरावर बघतो तर काय? एका ठिकाणी रुळाचा जोड खरोखरच निखळला होता, आणि नटबोल्ट इतस्तत: पसरले होते..

हे सगळं बघून इतर प्रवाश्यांचे अन् विशेषत: इंग्रजांचे तर डोळे पांढरे झाले..

त्या साध्याश्या तरुणाच्या समजदारीमुळं मोठा अपघात टळला होता..लोकं त्याचं कौतुक करू लागले..इंग्रजासोबतच गार्डलाही स्वत:ची क्षणभर लाज वाटली ‘आपलं नाव? ’ त्यानं अदबीनचं तरुणाला विचारलं..

“मी मोक्षगुंडम विश्वेशरैय्या..मी एक अभियंता आहे”

त्याचं नाव ऐकून सगळेच क्षणभर स्तब्ध झाले कारण या नावानं तोपर्यंत देशभरात ख्याती मिळवली होती..

लोकं त्या तरुणाची माफी मागू लागले..”अरे पण तुम्ही माफी का मागताय?” विश्वेश्वरैय्यांनी हसत विचारलं..

“ते..आम्ही..तुमची जरा खिल्ली..”

“ मला तर नाही बुवा काही आठवत. ” मंद स्मित करत विश्वेश्वरैय्यांनी सगळ्यांना लागलीच माफही करून टाकलं..

१८८३साली अभियांत्रिकी परिक्षा पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विश्वेश्वरैय्यांचं पहिलं प्रेम ‘ स्थापत्य अभियांत्रिकी ’ अर्थात सिव्हिल इंजिनिअरींग..

आपल्या करीयरच्या पहिल्या काही वर्षातच —-

त्यांनी कोल्हापुर-बेळगाव-धारवाड-विजापूर-अहमदाबाद-पुणे, इथं शहरांसाठी राबवल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा योजनेत भरपूर काम केलं..

१९०९ साली त्यांची म्हैसुर राज्याचा ‘ मुख्य अभियंता ‘ म्हणून नियुक्ती झाली.  सोबतच रेल्वेचं सचिवपदही मिळालं..

तिथं ‘कृष्णराज सागर’ धरणनिर्मितीत त्यांच्या योगदानाबद्दल भरपूर चर्चा झाली, कारण यामुळं प्रचंड मोठं क्षेत्र पाण्याखाली आलं होतं आणि वीजनिर्मितीसोबतच म्हैसुर-बंगलोर या शहरांना पाणीपुरवठाही झाला..

‘कृष्णराज सागर’ धरण विश्वेश्वरैय्यांच्या तांत्रिक कौशल्याचं अन् प्रशासकीय वकुबाचं प्रतीक ठरलं..

आता सोपं वाटत असेल, पण त्याकाळी इतकी मोठाली धरणं बांधणं तांत्रिकदृष्ट्या प्रचंड अवघड होतं..हायड्रोलिक इंजिनिअरींग तितकीशी विकसित नव्हती. आणि सगळ्यात मोठं आव्हान तर सिमेंटचं होतं..इतकं सिमेंट आणायचं कुठून? तेव्हा देश याबाबतीत संपूर्णपणे आयातीवर अवलंबून होता. आणि थोडक्यात सांगायचं तर ऐपतही नव्हती..

जलाशयात पाणी नियंत्रित करण्यासाठी विश्वेश्वरैय्यांनी पुस्तकापलिकडं जात विशेष तांत्रिक प्रयोग केले..त्यांनी धरणाच्या भिंतीजवळ विहिरीसदृश्य गोलाकार संरचना केली आणि त्यांना स्वयंचलित दरवाज्यांशी जोडलं, आणि दरवाजे धरणाच्या भितींच्या आत बसवले..

क्रमशः….

— प्रज्ञावंत देवळेकर 

संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर

मो. 9822363911

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ यमाssss (कविता)….प्रमोद जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ यमाssss (कविता)….प्रमोद जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

यमा, तुलाच फाशी द्यावी,

एवढा मोठा आहे गुन्हा !

बिपिन रावतांसारखी माणसं,

होत नाहीत पुन्हा-पुन्हा !

 

हेवा एवढा वाटला का रे?

नृसिंहाची बघून धमक !

काळालाही भिती वाटेल,

अशी नजरेमधे चमक !

 

इतके पर्याय असतानाही,

सुगंधावर टाकलास फास?

खादी नाले-डबकी आहेत,

त्याना केवढा कुबट वास !

 

बघ अख्खा देश यमा,

वीरासाठी करतोय शोक !

वाटलं नव्हतं क्रूरतेचं,

एवढं कधी गाठशील टोक !

 

वाचवणाराच नेऊन यमा,

केवढं मोठं केलंस पाप !

घरी जाशील तेव्हा कळेल,

बाप तुला देतोय शाप !

 

देवानीच का आदेश काढला?

स्वर्गच निर्धोक व्हावा म्हणून !

तिथला मुख्य सेनानीही,

बिपिन रावत हवे म्हणून?

 

सावित्री तर आजचीसुद्धा,

सत्यवानासोबत गेली !

चिरंजीवच हळद-पिंजर,

आठवणीनं सोबत नेली !

 

इथल्या मातीमधले संस्कार,

इथल्या मातीमधलं शौर्य !

चोरून नेमकं केलंस काय?

सिद्ध केलंस आपलंच क्रौर्य !

 

 -प्रमोद जोशी, देवगड.

9423513604

संग्राहक – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ विस्मरणात चाललेला ग्रामीण शब्दसंग्रह ☆ संग्राहक – श्री माधव केळकर

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ विस्मरणात चाललेला ग्रामीण शब्दसंग्रह ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

ग्रामीण भागातील दैनंदिन जीवनात सहजपणे वापरल्या जाणाऱ्या, मराठी भाषेला समृध्द 

करणाऱ्या, पण  काळाच्या ओघात काहीशा विस्मृतीत गेलेल्या शब्दांचा, संकल्पनांचा मागोवा—-

                      

जसजसं शेतीवाडीचं  यांत्रिकीकरण होऊ लागलं , गावगाड्याला नागरीकरणाने भरकटून टाकलं,   गावाकडचं घर बदललं आणि ‘बंगलो स्किम’ आली, तसतसे मग –

 

ओटा,       पडवी,        न्हाणीघर,      माजघर,      शेजघर,      माळवद,         धुराडे-धारे,

वासं-आडं,       लग,       दिवळी,       खुंटी,     फडताळ,      परसदार,         पोतेरं, 

चावडी,     चौक,      पार,     पाणवठा,   उंबरठा,     कडी कोंडी,     खुराडं,    उकिरडा, 

——-हे शब्द विस्मरणात गेले.

 

बैलगाडी जाऊन ट्रॅक्टर-यांत्रिकी अवजारं आल्यानं —-

 

औत,   रूमणं,    चाडं,    लोढणा,     वेसण,     झूल,    तिफण,     जू,    वादी, 

कासरा (लांब दोर),        दावं (लहान दोरखंड),     चराट (बारीक दोरी) 

——-या शब्दांना आपण हरवून बसलो. 

 

विहिरीवरची मोट गेली, पंप आले. परिणामी—-

 

 मोट,    नाडा,    शिंदूर,    धाव,   दंड,   ओपा,     पलान 

——–हे शब्द दिसेनासे झाले. 

 

खुरपणी,    मोडणी,     मोगडणी,    उपणणी,    बडवणी,    खुडणी,    कोळपणी, 

दारं धरणं,     खेट घालणं,      माळवं

——- यांचा अर्थ अलीकडच्या पिढीला समजत नाही. 

 

रास,    सुगी,   गंजी,   कडबा,   पाचुंदा,   बोंडं,   सुरमाडं,   भुसकट,   शेणकूट,   गव्हाण

——- या शब्दांचंही तसंच! 

 

धान्य दळायचं— दगडी जातं,   खुट्टा,   मेख,

——–हेही शब्द काळाच्या पडद्याआड चाललेत.

            

साळुता आणि केरसुणी– याऐवजी झाडू आला. 

 चपलेला— पायताण, 

गोडेतेलाला— येशेल तेल, 

टोपडय़ाला—- गुंची म्हटलं जायचं, 

———हे आता सांगावं लागतं.

 

गावंदर,    पाणंद,    मसनवाट

——हे असे शब्द नागरीकरणामुळं मागं पडले. 

 

चांभाराची रापी,      सुताराचा वाकस,      कुंभाराचा आवा, 

लोहाराचा भाता,      ढोराची आरी,          बुरूडाची पाळ्ळी

——ही हत्यारांची नावं आता कुणाला आठवतात? 

 

पतीला दाल्ला (दादला),       पत्नीला कारभारीण,

सासर्‍याला मामंजी,          सासूला आत्याबाई, 

नणंदेला वन्स,        बहिणीच्या पतीला दाजी म्हणतात,

——- हे आता नव्या पिढीला सांगावं लागतं, नाही का?

                   

स्वयंपाकघराचं किचन झालं–आणि कोरडयास (कोरडया पदार्थासह खायची पातळ भाजी) 

कालवण (ज्यात कालवून खायचे असा पातळ पदार्थ), आणि –

माडगं,    डिचकी,    शिंकाळं,    उतरंड,    भांची,    डेरा,    दुरडी,    बुत्ती, 

चुलीचा जाळ,    भाकरीचा पापुद्रा,    ताटली,    उखळ,    मुसळ 

——–हे शब्द नागर संस्कृतीनं बाजूला सारले.

 

रविवार हा सुट्टीचा दिवस—- निवांत असण्याचा दिवस म्हणून तो ‘आईतवार ‘ म्हटला जायचा

तर गुरुवार म्हणजे बृहस्पतीवार.

——-त्याचा अपभ्रंश होऊन बस्तरवार झाला.

 

पहाटेच्या वेळेला ‘झुंझुरकं’,    सकाळी लवकर म्हणजे ‘येरवाळी’ किंवा ‘रामपारी’    आणि सायंकाळला सांजवेळ , दिवेलागण,      ‘कडुसं (कवडसे) पडताना’ अशी शब्दयोजना होती.

 

अंगदट (बळकट),     दीडकं-औटकं (एकपासून शंभर पर्यंतच्या  संख्येची पावकी, निमकी,पाऊणकी दीडपट-पावणेदोन पट साडेतीनपट संख्या दाखवणारं कोष्टक), 

झोंटधरणी (भांडण),     पेव,     कोठी,     कणगी (धान्य साठवण्याचं साधन) 

———हे शब्दही आताशा हरवलेत.

                   

इस्कोट (बिघडवणं),       सटवाई (नशिब लिहिणारी देवता),      सांगावा (निरोप), 

गलका (गोंगाट),       हेकना (चकणा),     मढं (मृतदेह),      पल्ला (अंतर), 

शिमगा (होळी किंवा शंखनाद),      चिपाड (वाळलेला ऊस),    अक्काबाईचा फेरा (दारिद्रय़),

अक्करमाशा (अनौरस),       अवदसा (दुर्दशा),      इडा-पीडा (सर्व दु:ख),     कागाळी (तक्रार), 

चवड (रास, ढीग),     झिंज्या (केस),    वंगाळ (वाईट),    डोंबलं (डोकं),      हुमाण (कोडं), 

भडभुंज्या (चिरमुरे, लाह्या भाजणारा)

 

——–ही सगळी मराठी भाषेला ग्रामीण भागानं दिलेल्या शब्द- भेटीतली वानगीदाखल उदाहरणे . 

 

आपण देखील आपल्या शब्दसंग्रहात असलेले, आपल्या मनातील पिंपळ पानावर कोरुन ठेवलेले, मात्र सध्या कालबाह्य झालेले शब्द व संकल्पनाच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करु या.

संग्राहक : माधव  केळकर 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

श्री दत्तजयंतीच्या निमित्ताने “दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा” या ध्यानमंत्राविषयी मिळालेली थोडी  माहिती —-

 दिगंबरा हा मंत्र प.पू.वासुदेवानंद सरस्वती यांना ब्रह्मानंद येथे शके १८२५ साली स्फुरलेला  १८अक्षरी मंत्र आहे. या मंत्राच्या रूपाने त्यांना अंतिम सत्याचा साक्षात्कार झाला. या मंत्रामध्ये एकाक्षरी गणेशमंत्र ,गणेशबीज समाविष्ट आहे. काही प्रमाणात अग्नीबीजाचाही वापर केला आहे. या महामंत्राचे स्पष्टीकरण एका आरतीमध्ये प.पू.वासुदेवानंद सरस्वतींनी केले आहे.

 त्याचा अर्थ पू. श्रीदत्तमहाराज कवीश्वरांनी पुढीलप्रमाणे सांगितला आहे –

या मंत्रात “अहं ब्रह्मास्मि” मी ब्रह्म आहे, आणि ते तूच आहेस हे सांगितले आहे. यातील पहिल्या दिगंबराचा अर्थ आहे वस्त्र नसलेला– म्हणजेच उपाधि नसलेला. हे लक्षात आले म्हणजे आपल्या आतील शुद्ध अहं अर्थात आत्मा सर्वसाक्षी, निर्विकार, अनंत अनादि असून ब्रह्मच आहे. पहिल्या दिगंबरा या शब्दाने साक्षी स्वरूपाचे अनुसंधान आहे. 

पुढच्या दिगंबराचा अर्थ आहे दिशांनी वेढलेला म्हणजे आकाशासारखा सर्वव्यापी— –त्रिकालाबाधित.विश्व निर्माण करण्याची शक्ती ब्रह्माजवळ आहे   पण शक्ती त्याच्या स्मरणात नाही. ‘हे ईश्वरस्वरूप आहे तेव्हा सर्वव्यापी अशाप्रकारचे जे ब्रह्मस्वरूप आहे ते मी आहे.’ हे चिंतन दुसऱ्या दिगंबरात आहे. परमात्म्याचे सगुण साकार रूप म्हणजे श्रीपादवल्लभ, ब्रह्मरूप धारण करून आपल्या भक्तांचे रक्षण करते.

श्रीपादवल्लभ हा या मंत्रातला  तिसरा शब्द. त्यात श्रीपाद आणि वल्लभ असे दोन शब्द आहेत. “श्रीः पादेयस्य”–ज्याच्या चरणाजवळ श्री आहे. लक्ष्मीयुक्त परमात्मा आणि शक्तीयुक्त परमात्म्याचे स्मरण श्रीपाद या शब्दाने होते. सर्वांना संकटातून मुक्त करून कल्याण करणारा असल्याने तो वल्लभ आहे. श्रीपादवल्लभ या संबोधनात हेच सुचविले आहे. 

ईश्वर स्वरूप, ब्रह्म स्वरूप, दत्त स्वरूप आणि गुरूस्वरूप ही सर्व एकच आहेत. त्याचे अनुसंधान दिगंबरा या चौथ्या अक्षराने येथे केले आहे.’ कामक्रोधांनी त्रस्त झालेल्या मला मुक्त करून आपल्याकडे न्या ‘ अशी आर्त प्रार्थना या दिगंबरात दडलेली आहे.

अशा या महामंत्राचा जप करणे ही श्रेष्ठ उपासना आहे. या मंत्रामुळे साधकाची देहशुध्दी आणि चित्तशुध्दी होते. शरीर तेजस्वी होते. साधक दिव्यानुभव ग्रहण करण्यास समर्थ होतो. म्हणून दत्त संप्रदायाचा हा मुख्य मंत्र आहे. 

संग्राहक :- श्री सुनीत मुळे 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares