मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “व्यापार आणि दया…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ “व्यापार आणि दया…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक

 भाजीवाली रोजच्यासारखी दुपारी दारात आली आणि तिने ओरडून विचारले, “भाजी घ्यायची का मावशी?”

आई आतून नेहमीसारखी ओरडली, “काय आहे भाजी?”

“गवार हाय, तंबाटी, पालक,…. ” एवढे बोलताच आई म्हणाली, “थांब आले. “

दारात येऊन आईने भाजीवालीच्या डोक्यावरचा भारा पाहिला आणि विचारले, “पालक कसा?”

“रुपयाची गड्डी, ” – भाजीवाली.

“पन्नास पैशाला दे, चार घेते, ” – आई.

“नाय जमणार, मावशी, ” – भाजीवाली.

“मग राहू दे, ” – आई.

भाजीवाली पुढे गेली आणि परत आली. “बारा आण्याला दीन, “- भाजीवाली.

“नको. पन्नास पैशाला देणार असशील तर घेते, ” – आई.

“नाय जमणार, ” – भाजीवाली म्हणाली

आणि पुन्हा गेली.

थोडे पुढे जाऊन परत आली. आई दारातच उभी होती. तिला माहीत होते की भाजीवाली परत येईल. आता भाजीवाली पन्नास पैशाला द्यायला तयार झाली. आईने भारा खाली घ्यायला मदत केली, नीट निरखून पारखून चार गड्ड्या घेतल्या आणि दोन रुपये दिले.

भाजीवाली भारा उचलायला लागताच तिला चक्कर आली. आईने काळजीने विचारले, “जेवलीस का नाही?”

“नाय मावशी. एवढी भाजी विकली की दुकानात सामान घेऊन, मग सैपाक, मग जेवण, “- भाजीवाली.

“थांब जरा. बस इथं. मी आणते. ” म्हणत आईने दोन चपात्या आणि भाजी, चटणी एका ताटात आणून दिली. नंतर थोडा वरणभात दिला. जेवण झाल्यावर एक केळे दिले. पाणी पिऊन भाजीवाली गेली.

मला राहवलं नाही. मी आईला विचारले, “तू एवढ्या निर्दयपणे किंमत कमी केलीस, पण नंतर, जेवढे पैसे वाचवले त्यापेक्षा जास्त तिला खायला दिलेस. “

आई हसली आणि जे म्हणाली ते आयुष्यभर मनात कोरले गेले…

“व्यापार करताना दया करु नये आणि दया करताना व्यापार करु नये. “

कवी :अज्ञात

संग्राहक  : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ Mesponsible… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

? वाचताना वेचलेले ?

MESPONSIBLE – लेखक  : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

माझ्या आईला अनेक दिवस झोप येत नव्हती. तिला दमल्यासारखं वाटे. ती चिडखोर, चिडचिडी झाली होती.

…आणि एक दिवस अचानक ती बदलली…

त्या दिवशी माझे वडील तिला म्हणाले:

 – मी तीन महिन्यांपासून नोकरी शोधत आहे आणि मला नोकरी मिळाली नाही… मी निराश आहे, आज मित्रांसह बिअर घेणार आहे.

माझ्या आईने उत्तर दिले:

 -ठीक आहे… बिअरच्या बिलाचे तुम्हीच पाहा आणि रात्री उशीर झाल्यास मित्राकडेच झोपा..

माझा भाऊ तिला म्हणाला:

 – आई, मी विद्यापीठात सर्व विषयांमध्ये मागे आहे.. मला माहीत नाही, माझा निकाल कसा असेल..

माझ्या आईने उत्तर दिले:

 – ठीक आहे, तू अभ्यास केलास तर नक्कीच पास होशील. आणि जर तू तसे केले नाहीस तर, सेमिस्टरची पुनरावृत्ती करशीलच. पण शिकवणीची फी तुझी तूच द्यायची..

माझी बहीण तिला म्हणाली:

 – आई, मी कार ठोकली..

माझ्या आईने उत्तर दिले:

 – ठीक आहे बेटा, गॅरेजमध्ये घेऊन जा. आणि पैसे कसे द्यायचे, ते बघ. आणि गाडी दुरुस्त होईपर्यंत बस किंवा रेल्वेने फिर..

तिची सून तिला म्हणाली:

 – आई, मी तुमच्याकडे काही महिने राहायला येते आहे.

 माझ्या आईने उत्तर दिले:

 – ठीक आहे. लिव्हिंग रूमच्या पलंगावर सोय बघ आणि स्वतःसाठीचे ब्लँकेट शोध..

आईकडून येणाऱ्या या प्रतिक्रिया पाहून आम्ही सर्वजण काळजीत पडलो.

आम्हाला शंका आली, की ती डॉक्टरकडे गेली होती… कदाचित तिला त्या गोळ्यांचा ओव्हरडोस झाला असेल… त्यानंतर आम्ही आईसोबत बोलण्याचे ठरविले..

पण नंतर… तिने आम्हाला तिच्याभोवती गोळा केले आणि स्पष्ट केले:

प्रत्येक व्यक्ती तिच्या आयुष्यासाठी जबाबदार आहे, हे समजायला मला बराच काळ लागला. माझी व्यथा, चिंता, माझे नैराश्य, माझे धैर्य, माझा निद्रानाश आणि माझा ताण, तुमच्या समस्या सोडवत नाहीत, तर माझ्या समस्या वाढवतात, हे कळायला मला अनेक वर्षे लागली.

कोणाच्याही कृतीसाठी मी जबाबदार नाही, परंतु मी त्यावर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांसाठी मी जबाबदार आहे.

म्हणून, मी या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहे, की माझे स्वतःचे कर्तव्य आहे की शांत राहणे आणि तुमच्यापैकी प्रत्येकाला तुमच्याशी संबंधित असलेल्या गोष्टी सोडवायला लावणे..

मी योग, ध्यान, चमत्कार, मानवी विकास, मानसिक स्वास्थ्य आणि न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंगचे अभ्यासक्रम घेतले आहेत आणि त्या सर्वांमध्ये मला एक समान धागा आढळला…

मी फक्त स्वतःवर नियंत्रण ठेवू शकते. तुमच्या स्वतःच्या समस्या कितीही कठीण असल्या, तरी त्या सोडवण्यासाठी तुमच्याकडे सर्व आवश्यक संसाधने आहेत. माझे काम तुमच्यासाठी प्रार्थना करणे, तुमच्यावर प्रेम करणे, तुम्हाला प्रोत्साहन देणे हे आहे. परंतु तुमच्या समस्या सोडवणे आणि तुमचा आनंद शोधणे हे तुमच्यावर अवलंबून आहे.

तुम्ही मला विचारले, तरच मी तुम्हाला माझा सल्ला देईन आणि तो पाळायचा की नाही, हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्या निर्णयांचे चांगले किंवा वाईट परिणाम असतील आणि ते तुमचे तुम्हालाच भोगावे लागतील.

म्हणून आतापासून मी तुमच्या जबाबदाऱ्यांचे ग्रहण, तुमच्या अपराधाची पोती, तुमच्या पश्चात्तापाची धुलाई, तुमच्या चुकांची वकिली, तुमच्या विलापांची भिंत, तुमच्या कर्तव्याची निक्षेपी सोडून देत आहे…

आतापासून, मी तुम्हाला स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण प्रौढ घोषित करत आहे.

माझ्या घरी सगळेच अवाक् झाले होते.

त्या दिवसापासून, कुटुंब अधिक चांगले कार्य करू लागले. कारण घरातील प्रत्येकाला माहीत होते की त्यांना नेमके काय करणे आवश्यक आहे.

आपल्यापैकी काहींसाठी हे कठीण आहे. कारण आपण काळजीवाहू म्हणून मोठे झालो आहोत. आपण इतरांसाठी जबाबदार असतो. आई आणि पत्नी म्हणून आम्ही सर्व गोष्टींपासून दूर राहतो. आपल्या प्रियजनांनी कठीण प्रसंगातून जावे किंवा संघर्ष करावा, असे आपल्याला कधीच वाटत नाही. प्रत्येकाने आनंदी व्हावे अशी आपली इच्छा असते.

परंतु, जितक्या लवकर आपण ती जबाबदारी आपल्या खांद्यावरून काढून त्या प्रिय व्यक्तीवर टाकू, तितके चांगले. आपण त्यांना ‘MESPONSIBLE’ होण्यासाठी तयार करू…

प्रत्येकासाठी सर्व काही बनण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही… स्वतःवर जबाबदार्‍यांचा दबाव आणणे थांबवा…………

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मुके अभंग, मुक्या ओव्या… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ मुके अभंग, मुक्या ओव्या… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

आमच्या नवरा बायकोत कधी कधी भांडण व्हायचं. भांडण उंबऱ्याच्या बाहेर जाणार अशी शक्यता निर्माण झाली की, माझी आजी आम्हा दोघांना मायेने जवळ घ्यायची. समोर बसवायची. आमचे दोघांचेही हात हातात घेऊन बोलायची..

ती म्हणायची, “ लेकरांनो, असं करून कसं चालेल? अजून लै लांब जायचंय तुम्हाला.. बाळांनो, दोघं बी विस्तू झाला तर विझायचं कसं? कुणीतरी एकाने पटकन पाणी व्हावं आणि विस्तवावर सांडून जावं.. म्हणजे आग लागणार न्हाय.. अन् जर एकदा का आग लागली तर मग सगळं जळून राख हुईल.. ” तिच्या या वाक्याने आमच्या दोघांचं पाणी होऊन जायचं. आणि नकळतपणे आम्ही आजीचा हात धरलेला असायचा.

आजी पदर डोळ्याला लावून डोळ्यातून आलेलं पाणी पुसत बोलू लागायची. आजोबांच्या आठवणीत हरवून जायची. वादळातल्या, पावसातल्या आणि उन्हाने करपलेल्या पण त्यातून ही फुलवलेल्या तिच्या संसाराची गोष्ट सांगून झाली की, डोळे पुन्हा पदराने पुसत हळूच म्हणायची, “ आता या म्हातारीला घोटभर चहा मिळेल का बाबांनो?” त्यावर घरातले सगळे हसायचे.

आमचं भांडण मिटलेलं असायचं आणि आजी चहा पीत बसलेली असायची. आकाशातला एक जुना निखळलेला तारा त्याच्या अनुभवाचे असंख्य ऋतू माझ्या ओंजळीत ठेवतोय, असा भास मला नेहमी व्हायचा.. आणि आजही होतो..

आता माझी आजी नाहीय. ती गेली तिच्या प्रवासाला निघून कायमची. पण जाताना विस्तव आणि पाणी नावाचं समीकरण आमच्या अंत:करणाला देऊन गेली. अधूनमधून होतात आमची भांडणे, पण आग लागायच्या आधीच आम्ही पाणी होऊन विस्तु विझवलेला असतो. तिच्या जवळ बसून आम्ही त्यावेळी तिचं ऐकलं, म्हणून आज आम्हाला वाहत्या पाण्यासारखं जगता येतं..

तुम्हाला एक खरं सांगू.. ?

हे ओंजळीत अनुभवांचे ऋतू देणारे निखळलेले तारे आहेत. पण त्यांचं ऐकून घेणारी पिढी राहिलेली नाहीय. त्यामुळे आता आजी- आजोबा मुके झालेत.

परिणामी घटस्फोटासाठी आज वकिलांच्या ऑफिसमध्ये गर्दी मावत नाहीय. त्यांचं ऐकूनच घ्यायला आपण तयार नाहीयत. आज ते पिकलेलं पान, जुनं झालेलं झाड अशा यादीत त्यांना टाकून आपण मोकळे झालो आहोत.  

आणखी एक, घरातलं लहान बाळ रडायला लागलं की आधी त्याच्यासाठी हक्काची जागा आजीची मांडी असायची. आता बाळ रडत नाही कारण बाळाच्या मांडीवर आपण फोन देऊन मोकळे झालो आहोत आणि आजीची मांडी रिकामी झालीय. त्या म्हाताऱ्यानी नव्हे नव्हे त्या महान – ताऱ्यांनी आता हताश होऊन बोलणं बंद केलं आहे. परतीच्या प्रवासाचं तिकीट त्यांनी केव्हाच काढून ठेवलेलं आहे. घराच्या एका कोपऱ्यात मानेखाली उशी धरून चिमणीच्या पिलांसारखी चिव चिव करत वरच्या छताकडे एकटक नजर लावून ती पडलेली आहेत. ज्येष्ठ नागरिक संघात नाही मन रमले रे त्यांचे. त्यांना नातवंडे हवी असतात. पण नातवंडे मोबाईलवर नाहीतर करिअरच्या नादात बिझी झालीयत. आजीची आणि आजोबांची दुनिया आता मुकी झाली आहे. त्या पिढीला या पिढीशी खूप बोलायचं होतं; पण बोलताच आलं नाही. कारण ऐकायला कुणी नाही.

नेहमीप्रमाणे आजही या लेखाचा शेवट आशावादी असावा, असं मनाला वाटत आहे. परंतु, भूतकाळ गतप्राण आणि वर्तमान आंधळा झालेला असताना आदरणीय सुरेश भट यांच्या गझलेच्या ओळी माझा हुंदका वाढवत आहेत. त्या ओळी अशा…

“जरी या वर्तमानाला

कळे ना आमुची भाषा

विजा घेऊन येणाऱ्या

पिढ्यांशी बोलतो आम्ही”

मला नम्रपणे इतकंच सांगायचं आहे की, “भट साहेब, तुम्ही म्हणाला अगदी तसंच या पिढ्या विजा घेऊनच जन्माला आल्या. पण कान गमावून बसल्या. ठार…ठार…ठार.. बहिऱ्या झाल्या. फाईव्ह जीच्या आणि रिल्सच्या धूमधडाक्यात आजीच्या ओव्या मुक्या झाल्या.. मुक्या झालेल्या ओवीत आजोबांचे अभंग पुसले गेले. शेवटचा श्वास घेऊन आजी-आजोबा निघून जातील. पिकलेली पाने गळून पडतील आणि या पिढीला व्हॉटसअपच्या स्टेटससाठी एक जिव्हाळ्याचा विषय मिळेल. आणि विस्तवावर पाणी होऊन कुणाला सांडता येणार नाही. परिणामी सगळी राख झालेली असेल.

बस.. इतकाच हुंदका होता अडकून राहिलेला तो फक्त बाहेर काढला..

लेखक : अज्ञात

प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “किस्से कोर्टातले…” – लेखक : ॲड. श्री रोहित एरंडे ☆ प्रस्तुती – श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “किस्से कोर्टातले…” – लेखक : ॲड. श्री रोहित एरंडे ☆ प्रस्तुती – श्री जगदीश काबरे ☆

किस्से कोर्टातले… 

जिवंतपणी अन्न-अन्न आणि मेल्यावर पिंडदान…”

सध्या पितृपंधरवडा चालू आहे. आपल्या पितरांना / पूर्वजांना सद्गती मिळावी असा विश्वास असणारे पक्ष विधी करत असतात.

मात्र दरवर्षी पितृपंधरवडा सुरू झाला की एक जुनी केस आठवते..

आई – वडील गेल्यावर श्राद्ध पक्ष करा किंवा करू नका, पण ते जिवंत असताना तरी त्यांच्याशी नीट वागणे जास्त महत्वाचे आहे हे लक्षात येते.

आमच्याकडे एक केस होती. आई – वडिलांचा स्वतःचा बंगला होता आणि त्यात ते सुखाने राहत होते. मुलगा त्याच्या नोकरीसाठी त्याच्या कुटुंबाबरोबर परदेशी राहत होता.. मध्येच त्या मुलाला PhD करायची होती आणि त्याची फी खूप जास्त होती.. म्हणून त्याने आई वडीलांमागे टुमणे लावले की बंगला विकून त्याचा हिस्सा द्यावा. आई – वडिलांनी परोपरीने त्याला सांगितले की त्यांच्या मृत्यूनंतरच तुलाच ही मिळकत मिळेल, अशी भांडणे कशाला करतो आणि हा बंगला त्यांनी अत्यंत कष्टाने बांधला आहे, तिथे उत्तम बाग केली आहे, त्यांच्यानंतर तो त्यालाच मिळेल, पण व्यर्थ.. मुलाचे सल्लागार त्याची बायको आणि बायकोचे भाऊ..

मुलाने आम्हाला सल्ल्यासाठी फोन केला. मी म्हटले तुम्हाला आवडेल असा सल्ला देता येणार नाही, तर योग्य तो सल्लाच देईन आणि तो असा की आई वडिलांच्या स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये त्यांच्या हयातीमध्ये मुलांना काही हक्क नसतो..

मुलाने आई वडिलांशी संबंधच तोडून टाकले, ना फोन ना काही, आई-वडील वेड्या आशेने नातवंडांच्या फोनची वाट बघायचे..

नंतर सुमारे ७-८ महिन्यांनी वडील आजारी पडले आणि गेले आणि नंतर लगेचच आई पण गेली, पण एकाच्याही आजारपणाला किंवा अंत्यविधीला हे चिरंजीव ” कार्यबाहुल्यामुळे” येऊ शकले नाहीत !! 

नंतर एक – दोन वर्षांनी गणपतीच्या सुमारास त्या मुलाचा मला फोन आला की, ” सर मी पितृपंधरवड्यामध्ये पुण्याला येतोय, मला तुम्हाला भेटायचे आहे.. ” त्या प्रमाणे तो आला आणि विचारले की आई वडिलांनी काही विल करून ठेवले आहे का? मी सांगितले माझ्याकडे तरी नाही.. पण मी विचारले की अहो, तुम्ही आता अचानक कसे काय आलात, आई वडील गेल्यावरही आला नाहीत ?

तो म्हणाला, ” अहो काय सांगू, You know I’m trying hard for PhD admission but not been able to get through for some or the other reason… आणि आता बंगल्याचे पण काहीतरी करायला हवे ना ? “

नंतर म्हणाला, “अजून एक कारण आहे.. खरे तर माझा या श्राद्ध पक्ष या गोष्टींवर काही विश्वास नाही.. पण अहो गेले काही महिने आमच्याकडे सतत आजारपणे, माझ्या नोकरीत भांडणे, PHD admission मध्ये अडचणी, असे प्रकार चालू आहेत. मग माझ्या बायकोने तिच्या आईच्या सांगण्यावरून कोणाला तरी ऑनलाईन पत्रिका दाखवली, तेव्हा त्यांनी सांगितले की आई वडिलांचे श्राद्ध, पिंडदान केले तरच हे प्रकार थांबू शकतील, म्हणून आता बायकोच्या हट्टाखातर आलोय ” असे तो म्हणाल्यावर मी निःशब्द झालो..

मनात म्हटले, “Poetic Justice किंवा कर्माचा सिद्धांत म्हणतात तो हाच की काय ? आई वडील जिवंत असताना त्यांच्याशी भांडायचे, त्यांचे अंत्यदर्शन घ्यायलाही यायचे नाही आणि आता हे प्रकार करायचे. “जिवंतपणी अन्न-अन्न आणि मेल्यावर पिंडदान” ही म्हण आज प्रत्यक्षात बघितली.. असे किंवा त्यासारखे प्रकार कोर्टात घडताना दिसतात आणि नात्यापेक्षा पैशाला किंमत जास्त आहे असे दिसून येते.. पण असे करून सुख किंवा मानसिक शांतता लाभते का ? 

मला तरी या प्रश्नाचे उत्तर नाही असेच वाटते… What goes around comes around हे खरे.

लेखक : ॲड. श्री रोहित एरंडे

प्रस्तुती : श्री जगदीश काबरे 

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मुक्ती…” – लेखिका : सुश्री स्वाती नितीन ठोंबरे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “मुक्ती…” – लेखिका : सुश्री स्वाती नितीन ठोंबरे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

योगिनी सकाळी लवकरच उठली. आज वर्षश्राध्द होतं ना तिचं…! चोच घासली, पंख फडफडवले आणि आकाशातून खाली झेपावली घराकडे जाण्यासाठी…

वर्षभरापुर्वी याच घरातून निरोप घेतला होता तिनं सगळ्यांचा. तसा कारभार लवकरच आटपला होता तिचा. क्षुल्लक आजाराचं निमित्त झालं. मग एकात एक दुखणी. वर्ष-दीड वर्ष अंथरुणात… आणि एक दिवस सकाळी खेळ संपला! 

अगदी भरल्या संसारातून उठावं तसं झालं. मोठी २० वर्षांची आणि धाकटी १७ वर्षांची. म्हटलं तर दोघी सज्ञानच… पण आई म्हणून योगिनीचा जीव तुटायचा.

मोठी जगन्मित्र… सतत मित्र-मैत्रिणींचा गराडा. बहुधा घराबाहेरच बराचसा वेळ. अभ्यासात तशी हुशार… पण फारसं लक्ष नसायचं तिचं अभ्यास करण्यात. ‘hi mom… bye mom…’ केलं की पायात सॅन्डल्स सरकावून स्कूटीला कीक मारून पोरगी पसार!

कधी घरात सापडलीच, तर चार समजुतीच्या गोष्टी सांगण्याची पण सोय नाही… ‘मॉम्, प्लिज लेक्चर नको!’ मित्रपरिवार चांगला असला तिचा, तरी या वयात नको ती आकर्षणं काय कमी असतात का? मग योगिनी चिंता करत बसायची.

धाकटीचं तंत्र वेगळंच… ती अगदीच घुमी होती. सगळ्यात अलिप्त. तिला ना कधी आनंद व्यक्त करताना बघितलं, ना कधी दु:ख… तिच्या मनात काय चालू आहे, याचा थांगपत्ताही ती कधी लागू द्यायची नाही.

कधी कधी योगिनीला वाटायचं, ही आपलीच मुलगी का…? कसलाच संवाद नाही तिच्याशी! योगिनीच्या नवऱ्याच्या वळणावर गेली होती बहुधा… कारण तोही असाच अलिप्त, कोरडा. ऑफिसात पाटी टाकून घरी आला की, बराचसा वेळ टिव्ही बघण्यात, सोफ्यावर लोळण्यात जायचा त्याचा.

डोंबिवली–चर्चगेट प्रवास करून, दमून भागून योगिनी संध्याकाळी घरात यायची, तरी हा सोफ्यावरच…! तिच्या येण्याची दखलसुद्धा नाही. योगिनी होती म्हणून चार माणसं जोडून होती. नातेवाईकांचं येणं-जाणं, रीतीप्रमाणं देणं-घेणं, कार्याला हजेरी, कुणाचं हळदीकुंकू, डोहाळजेवण, बारसे, मुंज, लग्न… सगळे हिनंच बघायचं.

योगिनी आता घराकडे झेपावली… मुलींना डोळे भरून बघायला आतुर झाली होती ती. जरा कानोसा घेतला किचनच्या खिडकीत बसून, पण काही हालचाल दिसेना.

‘काव… काव…’ करत, पंख सावरत, कठड्यावरून चालत योगिनी हॉलच्या खिडकीपाशी आली. फोटो दिसला तिचा भिंतीवर… हार घातलेला.

नवरा आणि धाकटी एकमेकांना चिकटून बसले होते सोफ्यावर… ‘अंगानं भरली ही…’ धाकटीकडे बघत योगिनी स्वतःशीच पुटपुटली. घर तसं टापटीप दिसत होतं. ती जाताना जसं होतं तसंच… तिनं लावलेल्या तुळशीनं पण चांगलाच जोम धरला होता.

खिडकीबाहेर कपडे वाळत घातले होते. अगदी एका रेषेत… सुरकुतीसुद्धा नाही! योगीनीला जरा नवलच वाटलं. इतका टापटीपपणा ना कधी नवऱ्यानं दाखवला, ना कधी मुलींनी…! श्राद्धाची मात्र काही तयारी दिसेना. योगिनी हिरमुसली.

जरासंच पुढं माहेर होतं तिचं… आई थकली असेल, वाट बघत असेल… योगिनी माहेरच्या कठड्यावर विसावली. तिची आवडती जागा होती ती. तिथं बुचाचं गच्च भरलेलं झाड होतं. त्याच्या फुलांचा वास योगिनीला फार आवडायचा.

आईची चाहूल कुणी न सांगताच कळली तिला… हातात ताट घेवून थबकत आई कठड्यापाशी आली. नजरेनंच खूण पटली…

“घे बाई, भरपेट खा… तुझ्या आवडीचे भाजणीचे वडे केलेयत. केळ्याची कोशिंबीर आणि साय-भात… तुला आवडतो तस्साच. मुली एका वर्षात मोठ्या झाल्यात. मोठी धाकटीची अगदी आईच्या मायेनं काळजी घेते. मुलींची आत्या आणि काकू तर एक दिवसाआड एक फेरी मारतातच तुझ्या घरी… मुलींचे सगळे लाड अगदी प्रेमानं होतायत… आणि जावईबापूसुद्धा जातीनं कुकर लावतात. अगदी बेसिक, पण थोडा स्वयंपाकही करतात…

“श्राद्धाची तयारी घरी दिसली नाही म्हणून नाराज होऊ नकोस. तुझी मोठी… तुला आवडणारा शिरा घेऊन सकाळीच गेलीये अनाथाश्रमात मुलांना वाटायला… धाकटीनं तुला आवडणारं बटमोगर्‍याचं रोप लावलंय आज अंगणात…

“घडी नाही विस्कटली तुझ्या संसाराची… तू होतीस म्हणून सगळे लाडावलेले होते. मात्र घराला जे वळण लावून तू निघून गेलीस, त्या वळणानं हळूहळू का होईना नीटनेटका प्रवास चाललाय त्यांचा… 

“आता गुंत्यातून मोकळी हो… तू बावीस वर्षं सिंचलेलं संस्काराचं रोपटं छान फोफावलंय… आणि तुझ्या मुलींना आणि नवऱ्याला कवेत घेऊन भक्कमपणे उभं आहे, हे बघ आज… आणि निश्चिंतपणे मुक्त हो!”

लेखिका : स्वाती नितीन ठोंबरे

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ देवीची ओटी… लेखिका – सुश्री संजना इंगळे ☆ संग्राहिका – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

📖 वाचताना वेचलेले 📖

🌼 देवीची ओटी… लेखिका – सुश्री संजना इंगळे ☆ संग्राहिका – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

“मध्ये कुठेही थांबू नकोस, 10 च्या बसने तडक गावच्या लक्ष्मी मंदिरात ये… “

“हो सासूबाई.. “

“आणि काय काय घ्यायचं लक्षात आहे ना. ?”

“हो पण.. परत एकदा सांगता का, चेक करून घेते.. “

“किती गं वेंधळी तू, देवीची ओटी कधी भरली नाहीये का?? बरं एक काम कर, तुपाचा दिवा लागेल… तूप घे एका डबीत.. देवीसाठी एखादी साडी घे, बांगड्या आणि नारळ.. थोडीशी फुलं… आलं का लक्षात??”

“हो हो सासूबाई.. “

नीरा आज ऑफिस ला उशिरा जाणार होती, महत्वाची मिटिंग होती त्यात नीरा चे sugestions वापरण्यात येणार होते… पण सासूबाईंचा हट्ट…

नीरा आणि सूरज नोकरीनिमित्त फ्लॅट मध्ये रहात होते… सासर 30 किमी वर होतं… देवीची ओटी भरायची म्हणून सासूबाई गावच्या मंदिरात जाणार होत्या, सूनबाईनेही ओटी भरावी म्हणून त्यांनी तगादा लावला.. नीरा ने सासूबाईंच्या शब्दाचा मान ठेऊन त्यांना प्राधान्य दिलं आणि तयारीनिशी ती निघाली.. धावपळ बरीच झालेली तिची…

अखेर ती बस पकडून मंदिरात पोचली, सासूबाई तिचीच वाट बघत होत्या..

“हे काय?? ड्रेस वर आलीस?? साडी तरी घालायची… “

“अहो आई इथून सरळ ऑफिस ला जायचं म्हणून.. “

“काय बाई आजकालच्या मुलींना देवाधर्माचं काही कळत नाही.. बरं चल ओटी भरून घेऊ.. “

दोघीजणी आत गेल्या… तिथे एक वृद्ध पुजारी होते… देवीसमोर ओटी ठेवली की ते घेत असत.. आणि आत गाभाऱ्यात देवीला ठेवत..

त्यांना पाहून नीरा हसली, त्यांनीही प्रतिसाद दिला..

“तुम्ही ओळखता काय एकमेकांना??”

“हो… आम्ही.. “

“ते जाऊदे, गुरुजी ओटी भरून घ्या देवीला.. “

सासूबाई तिला तोडत म्हणाल्या… सासूबाईंनी साग्रसंगीत एकेक वस्तू परंपरे प्रमाणे देवीला वाहिली… नीरा गोंधळून गेली… तिला काही समजेना नक्की काय करायचं..

“आधी हळद कुंकू वाहा… अगं हे बोट नाही, त्या बोटाने.. आता अक्षता.. आता साडी ठेव, त्यावर पाच मुठा तांदूळ… एक मूठ परत घे… नारळ दे… “

नीरा सासूबाईंच्या सांगण्याप्रमाणे सर्व करत होती.. सासूबाई मधेच ओरडल्या..

“अगं ही कुठली साडी?”

“मी दिवाळीत काही साड्या घेतलेल्या, ही काही वापरत नाही मी.. “

“अगं एक दीड हजार ची साडी आहे ती… देवीला साधी 100 रुपयाची साडी द्यायची असते.. अरे देवा.. दिवाळी काढणार ही मुलगी… आणि हे तुप कुठलं?”

“घरी कढवलेलं… “

“अगं दिव्यासाठी बाजारातून स्वस्तातलं तूप आणायचं… आणि ह्या बांगड्या??”

“माझ्याच… नवीन घेतलेल्या, पण वापरल्या नाहीत.. “

सासूबाई डोक्याला हात लावतात… देवीला हात जोडतात, “देवी माते… सुनबाई अजून नादान आहे, तिची चुकी माफ कर, आणि ओटीचा स्वीकार करून आम्हाला पाव बाई.. “

गुरुजी सगळं बघत असतात, हे सगळं बघून म्हणतात..

“देवी तुम्हाला नाही पण तुमच्या सूनबाईला पावेल हो.. “

“काय?”

“होय… तुम्ही पूजा करताना स्वस्त, टाकून दिलेल्या, आपल्याला उपयोगात नसलेल्या वस्तू देवाला वाहतात, पण तुमच्या सुनेने घरी काढवलेल्या तुपाचा दिवा लावला, तिचीच एक साडी देवीला दिली, स्वतःच्याच बांगड्या देवीला दिल्या… देवीला तुम्ही जे अर्पण करता त्याच्यामागचा भाव हवा असतो.. तुमचा मोह तूप, साडी, बांगड्यांत आहे… पण तुमच्या सुनेने कसलाही मोह न धरता स्वतःच्याच वापरातील एक भाग काढून देवीला दिला… हेच महत्वाचं असत… एखादा लहान मुलगा आपला आवडता खाऊ खात असताना एक घास हळूच आईला भरवतो तेव्हा आईला किती कौतुक वाटतं, तेव्हा उष्टा घास भरवला म्हणून आई रागवत नाही… तसंच आहे हे… आणि देवीला मिळालेल्या चांगल्या वस्तू मी अनाथाश्रम मध्ये देऊन येतो, तुमच्या सुनेशी तिथेच भेट झालेली, ती दर महिन्याला तिथे देणगी देऊन येते… “

सासूबाईंना खूप वाईट वाटलं, देवाधर्माचं करत नाही म्हणून आपण सूनबाईला किती बोललो, पण खऱ्या अर्थाने तीच खरी भक्ती करतेय.. आपण फक्त स्वार्थीपणाने मोहात अडकून यांत्रिक पूजा करतोय याची त्यांना जाणीव झाली.

लेखिका : संजना सरोजकुमार इंगळे

संग्राहिका – शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆  पितृअष्टक… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

 

📚 वाचतांना वेचलेले 📚

☆ पितृअष्टक – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला

पुढे वारसा हा सदा वाढविला 

अशा नम्र स्मरतो त्या पितरांना

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || १ ||

*

इथे मान सन्मान सारा मिळाला 

पुढे मार्ग तो सदा दाखविला

कृपा हीच सारी केली तयांना

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || २ ||

*

मिळो सद् गती मज पितरांना

विनती हीच माझी त्रिदेवतांना

कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना 

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ३ ||

*

जोडून कर हे विनती तयांना

अग्नि वरूण वायु आदी देवतांना 

सदा साह्य देवोनी उद्धरी पितरांना

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ४ ||

*

वसुरूद्रदित्य स्वरूप पितरांना

सप्तगोत्रे एकोत्तरशतादी कुलांना 

मुक्तीमार्ग द्यावा उद्धरून त्यांना

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ५ ||

*

करूनी सिध्दता भोजनाची तयांना

पक्वान्ने आवडीनें बनवून नाना

सदा तृप्ती होवो जोडी करांना

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ६ ||

*

मनोभावे पुजूनी तिला, यवाने

विप्रास देऊन दक्षिणा त्वरेने 

आशिष द्याहो आम्हा सकलांना

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ७ ||

*

सदा स्मृती राहो आपुलीच आम्हा 

न्यून काही राहाता माफी करा ना 

गोड मानुनी घ्यावे सेवा व्रतांना 

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ८ ||

कवी : अज्ञात 

संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ निर्व्याज भक्ती …. लेखक – अज्ञात ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? वाचताना वेचलेले ?

 ☆ निर्व्याज भक्ती …. लेखक – अज्ञात ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

एकदा एक तरुण मुलगी एका संत महात्म्याकडे गेली आणि त्यांना आर्जवानं विनंती करत म्हणाली, “माझे बाबा गेले अनेक महिने आजारी असल्यानं त्यांना स्वतःहून काहीही हालचाल तर करता येत नाहीच, परंतु ते रुग्णशय्येला खिळून आहेत. तुम्ही एकदा येऊन त्यांना भेटाल का?”

“का नाही… ? नक्कीच येईन मी… ” करुणासागर असलेले संत उद्गारले.

त्या घरी भेट दिली असता, त्या संतांना असं दिसलं की रुग्णशय्येला खिळून असलेल्या त्या वृद्ध व्यक्तीच्या पलंगाशेजारी एक रिकामी खुर्चीही ठेवलेली आहे.

“तुम्ही कदाचित् मी येण्याचीच वाट पहात होता असं दिसतंय?” त्या खुर्चीकडे पहात संत म्हणाले.

“नाही… नाही… तसं नाहीये. ” वृद्ध व्यक्ती उद्गारली.

त्यानंतर ती वृद्ध व्यक्ती विनंतीच्या स्वरात म्हणाली, “हे महाराज! कृपया खोलीचं दार लावून घ्याल का?”

संतांनी दार बंद केल्यावर, वृद्ध व्यक्ती पुन्हा बोलू लागली, “खरं सांगायचं तर, या क्षणापर्यंत, मी या रिकाम्या खुर्चीचं रहस्य कोणापुढेही उघड केलेलं नाही… अगदी माझ्या लाडक्या मुलीलाही ते ठाऊक नाहीये. तुम्हाला म्हणून सांगतो, संपूर्ण आयुष्यभर, प्रार्थना कशी करतात ते मला कधीच समजलं नाही. नित्यनियमानं देवळात जाण्याचा परिपाठ कटाक्षानं पाळूनही मला प्रार्थनेचा खरा अर्थ कधी समजला नाही.

परंतु चारएक वर्षांपूर्वी माझा एक मित्र मला भेटायला आला असता, त्यानं मला सांगितलं की मी माझी प्रार्थना थेट परमेश्वरालाच सांगू शकतो. त्या मित्रानं मला सांगितलं की आपल्यासमोर एक रिकामी खुर्ची ठेवायची आणि तिथे प्रत्यक्ष परमेश्वरच स्थानापन्न झालेला आहे असं समजून समोर कोणी असताना आपण जसं त्या व्यक्तीशी संवाद साधतो ना तसाच संवाद खुर्चीत बसलेल्या परमेश्वराशी साधायचा. परमेश्वर आपली प्रत्येक प्रार्थना अगदी काळजीपूर्वकपणे ऐकत असतो. माझ्या मित्राचा हा सल्ला मी जसा जसा न चुकता पाळू लागलो तसा तसा तो मला अधिकच आवडू लागला. “

“त्यानंतर आता रोज दोन तास मी परमेश्वराशी गप्पा मारत असतो. मात्र, माझा हा संवाद माझ्या लेकीच्या दृष्टीला पडू नये याची मी दक्षताही घेत असतो, कारण जर एका रिकाम्या खुर्चीकडे पाहून मी गप्पा मारतोय असं तिनं पाहिलं तर तिचा गैरसमज होईल की आजारामुळे माझ्या डोक्यावर परिणाम झालाय. ”

त्या वृद्ध व्यक्तीचे हे शब्द ऐकून संतमहात्मा हेलावून गेले. प्रेम आणि भावनांचं मिश्रण असणारे अश्रू त्यांच्या डोळ्यातून वाहू लागले. आपल्या आश्रमात परतण्यापूर्वी संतांनी त्या वृद्ध व्यक्तीच्या माथ्यावर आपला वरदहस्त ठेवला आणि म्हणाले, “तुम्ही सर्वोच्च पातळीची भक्ती करत आहात. तुमच्या या साध्याभोळ्या भक्तीमधे खंड पडू देऊ नका. ”

पाच दिवसांनी, त्या वृद्ध व्यक्तीची मुलगी संतांना भेटण्यासाठी त्यांच्या आश्रमात गेली आणि वंदन करुन तिने त्यांना सांगितलं, “त्या दिवशी तुमच्याशी भेट झाल्यानं माझ्या बाबांना अत्यानंद झाला… पण काल सकाळी ते देवाघरी गेले.

त्या दिवशी मी कामासाठी निघण्यापूर्वी त्यांनी मला हाक मारली आणि मोठ्या प्रेमानं त्यांनी माझ्या कपाळावर ओठ टेकवले. यापूर्वी कधीही न दिसलेल्या एक प्रकारच्या आत्मिक आनंदानं आणि शांततेनं त्यांचा चेहरा न्हाऊन गेला होता. परंतु त्यांच्या डोळ्यात मात्र अश्रू होते. संध्याकाळी मी जेंव्हा घरी परतले, तेंव्हा एका अद्भुत दृश्यानं मी थक्क झाले – गेले काही महिने ज्यांना मदतीशिवाय स्वतःला कोणतीही हालचाल करता येत नव्हती, ते माझे बाबा पलंगात उठून बसलेले होते, परंतु त्यांचं मस्तक मात्र त्यांच्या पलंगाशेजारी ठेवलेल्या खुर्चीवर होतं… जणूकाही त्यांनी कोणाच्यातरी मांडीवर डोकं ठेवलंय. नेहमीप्रमाणे खुर्ची रिकामीच होती. जगाचा निरोप घेताना बाबांनी खुर्चीवर डोकं का बरं ठेवलेलं होतं याचं कृपया उत्तर मला द्याल का?”

त्या वृद्ध व्यक्तीच्या मृत्युची वार्ता ऐकून संतमहात्मा ढसाढसा रडू लागले आणि आपले दोन्ही हात आकाशाकडे उंचावून ते कळवळून परमेश्वराची प्रार्थना करु लागले, “हे प्रभू! जेंव्हा या जगाचा निरोप घेण्याचा माझा क्षण येईल ना तेंव्हा मीदेखील या मुलीच्या बाबांसारखाच निरोप घ्यावा एवढी कृपा माझ्यावर करा. ”

प्रभूच्या मांडीवर मस्तक ठेऊन जगाचा निरोप घ्यायचा असेल तर प्रत्येक क्षणी ‘तो’ सर्वत्र आहे हा विश्वास आधी निर्माण करता यायला हवा. असं ज्याला जमलं त्याला परमेश्वराचं प्रेम प्राप्त करणं अशक्य नाहीच आणि मानवीजन्माची हीच तर इतिकर्तव्यता आहे.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सपने… – लेखक – श्री रवीन्द्र भूरे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

सपने… – लेखक – श्री रवीन्द्र भूरे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

पार्ल्याची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला निघाली. मुलीच्या आग्रहाखातर मालाडला पॉश कॉम्लेक्समध्ये भाड्याने जागा घेतली. 36 मजल्याचे तीन टॉवर. नवीनच होती. त्यामुळे कमी लोक शिफ्ट झाली होती.

 

सकाळी फिरून येताना एक मुलगा गाडी पुसत होता. सुरेश …. बहुतेक यूपीचा असावा. त्याला म्हटले “ माझी गाडी पुसशील का ?” तो हो म्हणाला.

“पैसे किती घेशील ?”

तो …”. तुम्ही द्याल ते.” … अश्या वेळेस आपण नेहमी जास्तच देतो.

 

आता खूप लोक शिफ्ट होऊ लागली. गाड्याही वाढल्या. गाडी पुसणारी खूप मुले दिसू लागली.

सुरेशला म्हणालो… “ तुला कॉम्पिटिशन वाढली. ”

तो म्हणाला “ नाही, ही मुले मीच आणली, मीच कॉन्ट्रॅक्ट घेतो आणि ह्यांना पगार देतो. ”

 

त्या भागात कबुतरे जास्त होती. एक दिवस एक कबुतर गॅलरीत मरून पडले. काय करावे कळेना. शेवटी सुरेशला बोलावले. त्याने ते उचलून नेले. दुसऱ्या दिवशी तो जाळी लावणाऱ्या माणसाला घेऊन आला. जाळी लावून घेतली

 

US ला जाताना वरून बॅग्स काढणे, आल्यावर परत वर ठेवणे … सर्व सुरेश करत होता. पंखे पुसणे, काचा पुसणे ही कामे त्याचीच झाली. मला फ्रोझन शोल्डरचा त्रास सुरु झाला. ड्रायविंग जमेना. एक दिवस सुरेशला म्हणालो.. “ ड्राइवर शोध “.. त्याने खिशातून काढून ड्रायव्हिंग लायसन्स दाखवले, मग तो वेळ असेल तेव्हा माझा ड्राइवर झाला. सकाळी एका माणसाला घेऊन आला…

“साहेब… हा चांगला मसाज करतो. आपल्या बिल्डिंग मध्ये बऱ्याच जणांकडे करतो, चांगला आहे.” 

 

एक दिवस फिरून येताना गेटसमोर भाजीची गाडी दिसली. घरी आलो तर घरात भाजीची पिशवी.

बायको म्हणाली सुरेशने आणून दिली. त्याच्या भावानेच ती गाडी लावली आहे.

 

पार्ल्याची जागा तयार झाली. सुरेशला म्हटले “ घर साफ करायला चल “… गाडी तोच चालवत होता.

मी …” सुरेश काय नवीन ?”

सुरेश …”.. चायनीज फूडची गाडी टाकतोय … रात्री 11 ते 2 म्युनिसिपालिटी, पोलीस सर्वांची सोय केली आहे. आपल्या बिल्डिंगमध्ये एक पोलिटिकल लीडर राहतो.. त्याने मदत केलीये. साहेब एक सांगू..

ये बम्बई शहरमे कुछ सपने लेके आया हुं, वो पुरे करकेही रहुंगा…. माझे प्रिंसिपल एकच… कोणत्याही कामाला नाही म्हणायचे नाही … “ 

 

मध्ये 1 -2 वर्ष गेली. मुलगी US हुन येणार होती. बायको म्हणाली घर साफ करून घ्या. चांगल्या प्रोफेशनल लोकांकडून. मग गूगल सर्च करून एका प्रोफेशनल क्लीनर्सला फोन केला. काम आणि रेट ठरला. दुसऱ्या दिवशी बेल वाजली. दोन मुले मस्त युनिफॉर्म मध्ये आली. मला धक्काच बसला …. त्यातला एक सुरेश होता.

सुरेश…” साहेब ही माझीच कंपनी. मीच फॉर्म केली आहे. काम वाटताना तुमचा पत्ता बघितला म्हणून मी स्वतः च आलो. कामाची सवय मोडायची नाही …” 

मला त्याचे शब्द आठवले …. “ सपने पूरे करकेही रहूँगा…. ” 

 

मला त्याचे स्वप्न पुरे होताना दिसू लागले….

नाहीतर आम्ही मुंबईकर… भूमिपुत्र… आमची स्वप्नं तरी काय … 

  1. ते 5 नोकरी….

ट्रेन मध्ये बसायला चवथी सीट.. फार फार तर विंडो सीट 

नाहीतर 

एखादी वडा पावची गाडी…

लेखक : रवींद्र भुरे

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बावन पत्ते… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ बावन पत्ते… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

५२ पत्ते … या बद्दल आजवर वाईट किंवा फार तर टाईमपास एवढेच आपण सर्वांनी ऐकले किंवा पाहिले असेल. पत्त्यांचा खेळ म्हटला, की तो जुगाराचा खेळ वाटतो आणि खेळणारा जुगारी वाटतो ह्या पलीकडे आपल्याकडे माहिती नाही… म्हणजे यापलीकडे आपण विचारही करत नाही. पण त्यापलीकडे पत्त्यांविषयी खूप काहीही जाणून घेण्यासारखे आहे………

पत्ते हे सामान्यतः आयताकृती पातळ पुठ्ठ्याचे किंवा प्लॅस्टिकचे बनविलेले असतात.

बदाम, इस्पिक, किलवर (किल्वर) आणि चौकट. या चार प्रकारात प्रत्येकी 13 पत्ते मिळून 52 पत्त्याचा संच होतो. पत्त्याची विभागणी एक्का, दुर्री, तिर्री, या क्रमाने दशीपर्यन्त, गुलाम, राणी, राजा याशिवाय 2 जोकर असतात. तर…….

1) हे 52 पत्ते म्हणजे 52 आठवडे.

2) 4 प्रकारचे पत्ते म्हणजे 4 ऋतू….. प्रत्येक ऋतू चे 13 आठवडे.

3) या सर्व पत्त्याची बेरीज 364

4) एक जोकर धरला तर 365 म्हणजे 1 वर्ष.

5) 2 जोकर धरले तर 366 म्हणजे लीप वर्ष.

6) 52 पत्यातील 12 चित्र पत्ते. म्हणजे 12 महिने

7) लाल आणि काळा रंग म्हणजे दिवस आणि रात्र.

पत्त्यांचा अर्थ समजून घेऊ

1) दुर्री म्हणजे पृथ्वी आणि आकाश.

2) तिर्री म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि महेश

3) चौकी म्हणजे चार वेद  (अथर्ववेद, सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद)

4) पंजी म्हणजे पंच प्राण  (प्राण, अपान, व्यान, उदान, समान)

5) छक्की म्हणजे षड रिपू  (काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, लोभ)

6) सत्ती- सात सागर

7) अटठी- आठ सिद्धी

8) नववी- नऊ ग्रह

9) दसशी- दहा इंद्रिये

10) गुलाम- मनातील वासना.

11) राणी- माया.

12) राजा-सर्वांचा शासक.

13) एक्का- मनुष्याचा विवेक.

14) समोरचा भिडू – प्रारब्ध.

 मित्रांनो, लहानपणा पासून पत्ते बघितले असतील. काहींनी खेळले असतील; परंतु त्या पत्त्यांच्या संचाबद्दल माहिती होती का ? 

त्याचे उत्तर बहुदा नाहीच असेल. आहे ना गंमतीशीर आणि ज्ञानदायी.

पत्त्याचा डाव खेळताना आयुष्याच्या डावाचा अर्थ समजून घेतला तर जगणे नक्कीच सोपे होऊ शकते!!!

नवरा बायको — पहिली पिढी

2) मुलं (सख्खी भावण्डं) — दुसरी पिढी —आई वडलांकडून 50%-50% chromosome मिळतात. 50% गुणसूत्रे share करतात.

3) तिसरी पिढी — नातवंडे — पहिली पिढी म्हणजे आजी आजोबांची 25% गुणसूत्रे share करतात.

4) चौथी पिढी — पहिल्या पिढीचे 12. 5% गुणसूत्रे share करतात.

5) पाचवी पिढी — पहिल्या पिढीचे 6. 25% गुणसूत्रे share करतात.

6) सहावी पिढी — पहिल्या पिढीचे 3. 12 % गुणसूत्रे share करतात.

7) सातवी पिढी — पहिल्या पिढीचे 1. 56% chromosome share करतात.

8) आठवी पिढी —पहिल्या पिढीचे < 1% share गुणसूत्रे करतात.

म्हणून मूळ पुरुष, जोडप्यापासून सातव्या पिढीपर्यंत नातं, भाऊबंदकी मानतात. नात्यात म्हणजे सातव्या पिढीपर्यंत विवाह निषिद्ध मानतात. विवाह केल्यास जन्यजात गुणसूत्रीय आजारांची शक्यता असते. अनेक समाजात मामाच्या मुलीशी विवाह करतात. पण धार्मिक/ वैज्ञानिक दृष्टीने निषिद्ध आहे.

आठव्या पिढीपासून नातं, भाऊबंदकी मानत नाहीत.

म्हणून पती-पत्नी चं नातं हे सातजन्मांचं मानतात. सात जन्मं हे नातं टिकतं.

तीन पिढ्या सपिंड मानतात. तीन ते सात पिढ्या सपिण्ड नव्हे पण भाऊबंदकी मानतात.

आणि सात पिढ्यांनंतर नातं संपुष्टात येतं, पण सगोत्र राहतात. !!!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares