☆ जगायचं राहून जाता कामा नये… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆
क्षणभंगूर जीवनामध्ये किती दिवस आहोत आणि कधी विकेट जाईल, याची काहीच खबर नाही कोणालाच. आयुष्य जातं रुसण्या फुगण्यात, अबोला पकडण्यात, बऱ्याच वेळा आधी कोणी बोलावं यातही वर्षं निघून जातात. जीवनाच्या सर्व्हिसमध्ये कोणीच पर्मनंट नाही, मित्रांनो. आज आहे तर उद्या नाही. शेवटी फक्त फोटोरुपी आठवणीच राहतात. जगून घ्या, बोलून घ्या, मनमुराद हसून घ्या, आलंच रडायला तर रडूनही घ्या. रुसलं असेल कोणी तर स्वतः बोलून सुरुवात करून पहा. प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे. वय, नोकरी, व्यवसाय, प्रतिष्ठा, जात पात, धर्म यापलीकडे जाऊन जगता आलं पाहिजे. नाचायची इच्छा असेल तर नाचून घ्या. लहानपणी वाटतं, मोठं व्हावं. मोठेपणी वाटतं, श्रीमंत व्हावं आणि म्हातारपणी वाटतं, परत लहान व्हावं. या सगळ्या चक्रव्युहात जगायचं मात्र राहून जातं. ज्याला जे आवडतं, त्यासाठी स्वतः वेळ काढावा. खूप कमवून तरी कुठं घेऊन जायचं आहे? आणि समजा कमवलं, तरी पुढच्या पिढीला ते टिकवता आलं पाहिजे, यावरही आपला अभ्यास हवा. आज मन मारून जगालही पण तुमच्या मनाचं काय ? पैसे नक्कीच कमवा, पण स्वतःसाठी ही थोडं जगा, मित्रांनो. खूप काही कमवालही. पण स्वतःचे छंद, स्वतःची आवड, स्वतःच्या इच्छा जर राहिल्या असतील तर मात्र सर्व काही कमावूनही आपण कफल्लक आहोत. म्हणून मित्रांनो, जगायचं राहून जाता कामा नये असं जगा.
कवी :अज्ञात
प्रस्तुती: सुश्री मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मैत्री – तारुण्यातील आणि पन्नाशीनंतरची… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर☆
तारुण्यातील मैत्री व पन्नाशी पार नंतर ची मैत्री यात बराच फरक असतो.
तारुण्यातल्या मैत्रीत खूप मजा असते, आपण तारुण्यात कोणाची कदर करत नसतो कारण तेव्हां मैत्रीचा खरा अर्थच कळलेला नसतो…. मैत्री टिकली तर टिकली नाहीतर उडत गेली. कधी आपण पुढचा विचार करत नाही व पाठीमागे वळून पण पाहात नाही. आपण आपल्या विश्वात खूप रमून जातो आणि आपलं विश्व त्या बेडकाच्या डबक्यासारखे असते. डबकं सोडून कधी विशाल सागराचा विचारच केलेला नसतो पण जेव्हां पन्नाशीला पोहचतो तेव्हां कधी डबकं सोडून सागराला मिळालेलो असतो ते कळत सुध्दा नाही…
जेव्हा पन्नाशीच्या सागरात मित्र मैत्रिणी भेटतात तेव्हां सगळ्या नात्यात ते मैत्रीचे नाते इतकं आपलसं वाटत असते कि, ती मैत्री खूपखूप हवी हवीशी वाटत असते.
नात्यापेक्षा मैत्रीचा आधार खूप हवासा वाटत असतो. मैत्रीत खूप मोकळेपणा असतो, त्यात भेद अजिबात नसतो. आपली विचारांची तार जर जुळत असेल तर सर्व गोष्टी पडद्या आड न ठेवता आपण मनसोक्त गप्पा – गोष्टी करतो आणि आपलं कोणी ऐकून घेतं किंवा आपल्यासाठी वेळ काढतो, आपल्याला समजावून जो घेतो, सुखादु:खात सहभागी होतो व चुकलं तर बोलतात व माफ ही करतात असे मिळालेले मित्र म्हणजे ‘नवरत्ना’ तल्या रत्नातले कोहिनूर हिरेच म्हटंल तर वावगे ठरणार नाही.
आपण कोणाचे कोणीच नसतो पण आपलं मात्र काहीतरी ऋणानुबंध असतात म्हणूनच आपली भेट कोणत्या ना कोणत्या रुपात ही नक्कीच होते.
आत्ता आयुष्याची पन्नाशी ओलांडल्यावर पुढचे आयुष्य हे बोनस आयुष्य आहे तेव्हां या वळणावर जेवढे मित्र मैत्रिणी भेटतात त्यांना भेटूया….
कोणाला काय माहीत की आपला प्रवास हा कुठे पर्यंत आहे? प्रत्येकाचे स्टेशन वेगळे आहे…
ते आले की उतरावेच लागते…
म्हणून जो पर्यंत प्रवास आपला चालू आहे त्या प्रवासात सगळे मनातल्या तक्रारींना काढून टाकूया. माहीत नाही परत आपण कधी, कुठे आणि कसे भेटू ? म्हणून मैत्रिची ही साथ खूप आधाराची व समाधानाची वाटते हे मात्र नक्की!!
पण अशी मैत्री समजुन घेणारे फार कमी असतात. ज्याला खरे निस्वार्थी मित्र लाभले ते भाग्यवान…
Friends Forever…
लेखक: अज्ञात
प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
देशाचे दिशादर्शक, आधार, विश्वास, शोअभिमानाचे नाव, सामाजिक भानाचे नाव, सुरक्षित गुंतवणुकीचे नाव, देश विकासात सिंहाचा वाटा, तत्त्व, स्वत्व, अस्तित्व, यत्र तत्र सर्वत्र साम्राज्य तरीही विनम्र आणि साधेपणाचे नाव, अनमोल रत्न, अजातशत्रू, घराघरात आणि जनसामान्यांच्या मनात असे हे रतनजी टाटा यांना अखेरचा टाटा.
☆
कवी : अज्ञात
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सासरी सून “लक्ष्मीच्या” पावलांनी येणारी हवी होती.. मग ती नोकरीही करू लागली…
झालं… लक्ष्मीबाई नारायणाचा हात धरून सासरी गेल्या..
वटपौर्णिमेला “सावित्री ” बनून नव-याच्या दीर्घायुष्याचा वसा घेतला.. व श्रावणात “मंगळागौर” बनून नाच नाच नाचली… पुढच्याच श्रावणात “जिवती” होऊन जिवावर उदार झाली नि बाळाच्या जन्माची, संगोपनाची आणि संरक्षणाची जबाबदारी तिने आनंदाने घेतली.
भाद्रपदात तिनं “गौरीचं” रूप घेतलं नि दिवसरात्र राबली..
नवरात्रीत तर तिला सा-यांनी “अष्टभुजा”च बनवलं..
ती जाम खूश झाली..
आता देवी म्हटलं की दैवी ऊर्जा दाखवण्याची जबाबदारी तिचीच नाही का ? मग काय आठ हातांनी तिने स्वयंपाक, घरकाम, नोकरी, बालसंगोपन, पतीसेवा, आदरातिथ्य, सणवार, शुश्रूषा सारं सारं केलं..
अगदी
करणेषु मंत्री, कार्येषु दासी
भोज्येषु माता, शयनेषु रंभा
झाली…
ती स्वत:ला देवीच समजायला लागली.. सगळीकडे नुसतं गुणगान होऊ लागलं तिचं.. “अन्नपूर्णा”, “लक्ष्मी”, “सरस्वती”, “मातृदेवी”, “अष्टभुजा” या विशेषणांचा तिला कैफ चढला..
आणि हो, बाईनं कसं सालस असावं, सगळ्यांशी मार्दवानं बोलावं, थोरांचा मान राखावा, नव-याशी आदरानं बोलावं, चेहरा नेहमी आनंदी ठेवावा, दुखलं-खुपलं तर कुणाला सांगू नये.
दुर्गामाता, कालिकेचं रूप मूर्तीपुरतंच बरं दिसतं… तिनं हेही सांभाळलं सगळं…
स्वत: शिळं खाल्लं, कितीतरी इच्छा मारल्या… कारण तिला देवी बनायचं होतं…
तसं शिकवलंच होतं मुळी…
मुलं शिकून मोठी झाली.. भुर्रकन उडून गेली. आईची गरज वाटेनाशी झाली… तिचं रूप ओसरलं नि नव-याचं प्रेम विरलं..
दुर्लक्ष झालेल्या शरीरानं असहकार पुकारला.. चार दिवस घरात कौतुक झालं…
ती हुरळली..
पाचव्या दिवशी सासूसास-यांच्या कपाळावर आठी आली.. आईवडील कधीचे सोडून गेलेले.. मुलं दिसेनाशी झालेली.. नव-याला आता तिचं ओझं होऊ लागलेलं..
“रोज मरे त्याला कोण रडे”. त्याचं तिच्याकडं साफ दुर्लक्ष.
आणि खरंच एके दिवशी ती मरून गेली… तिचं नामोनिशाण राहिलं नाही…
“ही निघून गेली, तिनं स्वत:ची काळजी घ्यायला नको होती का ? आता त्याने बिचा-याने कसं जगायचं ?”
हिच्या मरणाचं काहीच नाही; सा-यांना त्याचाच कळवळा आला..
“शेळी जाते जिवानिशी, खाणारा म्हणतो वातड कशी”
अशी तिची गत झाली..
वर्षभरात नव-यानं तिच्या जागी दुसरी “अष्टभुजा” आणली…
स्वर्गात बसलेल्या तिला खरोखरची “अष्टभुजा” बोलली…
“अशी कशी गं तू वेडी ? तुला सा-यांनी देवी म्हटलं नि तुला ते खरंच वाटलं… राब राब राबलीस… स्वत:कडं दुर्लक्ष केलंस नि इथं येऊन बसलीस… “
तिला ते पटलं… देवीच्या कुशीत शिरून खूप रडली…
तिला देवीनं शपथ दिली..
“उतणार नाही मातणार नाही…
स्वत:कडे दुर्लक्ष करणार नाही..
गोड गोड बोलण्याला भुलून
देवी बनायला जाणार नाही..
मी साधी माणूस आहे
माणसासारखं वागणार
रागवणार चिडणार
भांडणंसुद्धा करणार
मी व्यायाम करणार
विश्रांतीही घेणार
तब्येतीला माझ्या
खरंच मी जपणार
संसार दोघांचा आहे तर
दोघांनी सारखं काम करावं
मी लक्ष्मी व्हायला हवी तर
त्याने नारायण व्हावं… “
हे ऐकून दुर्गादेवी तिच्यावर प्रसन्न झाली..
तशी ती तुम्हा-आम्हावरही होवो !
साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण !
☆
लेखिका: श्रीमती नीला महाबळ गोडबोले
प्रस्तुती: श्रीमती दीप्ती गौतम
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आज एक मुलगी रेल्वे स्टेशनला ५ रु. मीटरने ताजेतवाने तोरण विकत होती.
बाजूचे सगळे २०/३०रु. ला विकत होते.
मी तिला विचारलं, “सगळे २०/३० रुपयांनी विकत आहेत. तुझा शेवटचा माल शिल्लक राहिला आहे, म्हणून पाच रुपयांनी विकतेस का?”
ती थोडं थांबली व मला म्हणाली,
“दादा, आयुष्यात पहिल्यांदाच रस्त्यावर बसून विकतेय फुलं. बाप नाही. आई निघून गेली. आजी सांभाळते मला.
सकाळी १००/- रुपये दिले आजीने. डाळ तांदूळ आणायला. विचार केला, म्हातारीला गिफ्ट द्यावं.
म्हणून ट्रेन पकडून इकडे आले दुपारी ३ वाजता. फुलं, दोरा, सुई विकत घेतली. ८०/- रुपये खर्च झाले.
पहिले मी पण वीस रुपयांना विकले.
आजीने दिलेल्या १००/- रुपयांचे ३००/- रुपये केले. आता उरलेली पाच तोरणं विकली गेली, तर ठीक! नाहीतर, घराला बांधीन! पहिली कमाई म्हणून. “
मी शांतपणे खिशात हात घातला. १०० रुपये काढून तिला दिले आणि म्हटलं, ” पोरी हे पैसे ठेव, मला तोरण नको. माझ्याकडून तुला तुझ्या मेहनतीचं गिफ्ट. घरी जा. ह्यातील एक तोरण तू दरवाजाला लाव. आणि हो. हे घे अजून ५० रुपये. जाताना तुला अणि आजीला काहीतरी गोड घेऊन जा. “
कालच बायको म्हणत होती,
“देवीची ओटी जरा वेगळ्या पद्धतीने भरू. “
आज तिची इच्छा पूर्ण झाली.
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर
☆ फजान…. लेखक – डॉ. शिरीष भावे ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆
नॅशनल जिओग्राफिक वाहिनीवरचे माहितीपूर्ण लघुपट पाहणे हा माझा फावल्या वेळातला आवडता छंद. असाच एक लघुपट, थायलंडमधल्या हत्तींच्या प्रशिक्षण केंद्रावर आधारित, मी पाहत होतो. जंगली हत्तींना माणसाळावून त्यांचा वापर करणे ही एक अमानुष प्रक्रिया आहे. पर्यटकांना जंगलातून पाठीवर बसवून फिरवणे अथवा लाकडी ओंडक्यांसारख्या जड वस्तू वाहून नेणे अशा गोष्टींसाठी हत्तींचा वापर केला जातो. महाकाय आणि शक्तिशाली असलेलं हे जनावर सहजासहजी माणसाळत नाही. फासे टाकणे, खड्डा खोदून त्यात सापळा लावून त्यांना पकडणे अशा मार्गांनी त्यांना आधी बंदिस्त करावं लागतं आणि त्यानंतर सुरु होते त्यांच्यावर हुकमत गाजवण्यासाठी, त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी केली जाणारी अघोरी प्रक्रिया. पकडलेल्या हत्तीला साखळदंडाने बांधून एका छोट्या लाकडी पिंजऱ्यामध्ये कोंडलं जातं. त्यानंतर उपाशी ठेवणे, भाल्यांनी टोचणे, झोपू न देणे अशा मार्गांनी त्याचा अनन्वित छळ केला जातो. इंग्रजीमध्ये याला “ब्रेकिंग द स्पिरिट ऑफ द एलिफंट” म्हणजे हत्तीची आंतरिक उर्मी आणि जिजिविषा नष्ट करणे असं म्हणतात. या सर्व क्रूर प्रक्रियेला ‘ फजान ‘ असं म्हणतात.
मी पहात असलेल्या लघुपटामध्ये त्या प्रशिक्षण केंद्राचा प्रमुख कार्यक्रमाच्या निवेदकाला माहिती देत होता. एके ठिकाणी एक प्रचंड मोठा, लांबलचक सुळे असलेला हत्ती उभा होता. निवेदकाच्या लक्षात आलं की त्याच्या पायात एक जाडजूड साखळदंड बांधलेला आहे पण तो दुसऱ्या बाजूला कुठेच बांधलेला नसूनही तो हत्ती इंचभरही जागचा हालत नाहीये. त्यानी ,”हे कसं” असं आश्चर्याने विचारलं तेव्हा केंद्रप्रमुख म्हणाला,” ती साखळी फक्त त्याच्या पायात अडकवलेली पुरेशी असते. ती दुसरीकडे बांधायची गरज नसते. ती साखळी त्याच्या पायात आहे याची नुसती जाणीव त्याला असली की तो जागच्या जागी उभा राहतो!”
लघुपट संपला आणि मी अंतर्मुख झालो. ही अशीच साखळी आपल्या विस्तृत, खंडप्राय देशाच्या पायात अडकवून इंग्रज निघून गेले. 1947 साली त्यांनी ती दुसऱ्या बाजूने सोडली तरी अजूनही आपल्या मनात ती काल्पनिक शृंखला बांधलेलीच आहे. 1835 साली लॉर्ड मेकॉलेने अतिशय धूर्तपणे या देशाच्या शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल केला. इंग्रजी भाषेला सर्वोच्च दर्जा दिला गेला. स्थानिक भाषांचं महत्त्व पद्धतशीरपणे छाटलं गेलं. इंग्रजी भाषेचा साखळदंड आपण अजूनही पायात दिमाखात मिरवतो. आपल्या समृद्ध स्थानिक भाषांमध्ये व्यवहार करणं आपण कमीपणाचं समजतो. भाषेबरोबर तिच्याशी निगडित संस्कृती आली आणि झालं आपल्या राष्ट्रीय अस्मितेचं आणि क्षमतेचं खच्चीकरण. इंग्रजांनी आपला सामूहिक आत्मविश्वास इतका नष्ट केला की स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षं होऊनही बरेचसे नियम आणि अधिनियम इंग्रज राजवटीमध्ये अंमलात असलेले अजूनही आपण वापरतो. मोटार वाहन अधिनियम इंग्रजांनी 1919 साली बनवला आणि तो स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष तसाच राबवला जात होता.
वैयक्तिक जीवनात अशी काल्पनिक साखळी मनात बांधून जगणारे अनेक जण आहेत. राहुलचंच उदाहरण बघा ना.
काही दिवसांपूर्वी अतिशय विष्षण मनोवस्थेमध्ये मला भेटायला आला होता. एका बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पगाराची उत्तम नोकरी होती. परंतु कुठल्यातरी गूढ तणावाखाली असल्याच्या खुणा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. मी विचारलं,” काय रे राहुल, इतका चिंताग्रस्त का तू?” “माझ्या बॉसला मी प्रचंड घाबरतो.आज नोकरी लागून दहा वर्ष झाली तरीसुद्धा तो मला रागवेल, वाईट साईट बोलेल अशी उगीचच भीती सतत मनात असते. खरंतर माझ्यावाचून त्याचं पान हलत नाही; पण मी मात्र निष्कारण तणावाखाली जगतो.”
मी म्हटलं,” पण तू तर त्या ऑफिसमधला एक महत्त्वाचा दुवा आहेस. तुला असं राहण्याचं कारणच काय?”
“मी जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा पहिल्या सहा महिन्यांमध्ये माझा बॉस माझ्यावर येता जाता उगाचच डाफरत असे. ती दहशत अजूनही माझ्या मनात खोलवर रुजलेली आहे. मी त्यातून बाहेर पडू शकत नाहीये. तो नवीन येणाऱ्या सगळ्यांनाच अशी वागणूक देतो, हे मी पाहिलंय.” “म्हणजे तुझ्या बॉसने तुझं फजान केलं तर.” असं म्हणून मी राहुलला हत्तीची गोष्ट सांगितली. “ती साखळी नाहीच आहे, खरं तुझ्या पायात. तू ज्या क्षणी ती मनाने काढून टाकशील त्या क्षणी एका मुक्त मनाचा जन्म होईल. आत्ताच्या आत्ता, या क्षणी ते तू कर राहुल”.
माझ्या नजरेला नजर देत त्यानी रोखून पाहिलं आणि फक्त ” येस्स्ssss” असं म्हणत तो निघून गेला.
योगायोग असा की त्यानंतर दोन दिवसांनी रूपालीची भेट झाली. तीसुद्धा अशाच कुठल्यातरी दबावाखाली असल्याची चिन्हं मी ओळखली.
“माझं लग्न होऊन मी सासरी आले आणि माझ्या सासूबाईंनी पहिल्या वर्षात माझा पूर्ण ताबा घेतला. मला कुठलंच स्वातंत्र्य नव्हतं. साध्या साध्या गोष्टीत त्यांची सतत दादागिरी असे. खरंतर आज लग्नानंतर दहा वर्षांनी मी त्यांच्यावर कुठल्याच दृष्टीने अवलंबून नाही. माझं स्वतःचं करियर आहे, अस्तित्व आहे आणि आर्थिक स्वातंत्र्यही आहे. पण तरीसुद्धा माझ्या मनात भीती असते, त्या मला कशावरून तरी बोलतील. आता खरं तर त्या तशा वागतही नाहीत. पण मी ही मनातली बेडी कशी झुगारून देऊ?”
मी मनात म्हटलं ,”हे अजून एकाचं फजान. “
राहुलला जे सांगितलं तीच गोष्ट मी रुपालीला ऐकवली. “रूपाली सासूबाईंनी फजान केलं तुझं. फेकून दे ती मनातली साखळी.” अचानक साक्षात्कार व्हावा, याप्रमाणे ती दुर्दम्य आत्मविश्वास आणि दृढनिश्चय मनात घेऊन माझ्या समोरून गेली.
काही महिन्यांनी दोघेही भेटले. दोघांचेही पहिलं वाक्य तेच होतं. “काका, फजान संपलं. साखळी आता पायातही नाही आणि मनातही.”
आपल्या देशाच्या पायातीलही ती मायावी शृंखला गळून पडण्याची मी आशेने वाट पाहतोय.
लेखक : डॉ. शिरीष भावे
संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ भाकरी – – लेखक : डॉ. दीपक रानडे ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
☆
सर्जरी संपायला उशीर झाला होता. ट्युमर खूपच लोचट, चिकट. आणि हात लावीन तिथे भुसभुस रक्तस्राव होत होता. सकाळी 9. 30 ला सुरुवात केलेली केस, अखेर संध्याकाळी 5. 45 ला संपली. पोटात भुकेचा वणवा पेटला होता. ह्या कोविड प्रकरणामुळे ऑपरेशन थिएटरच्या मजल्यावर असलेले कॉफी शॉप बंद होते.
सेकंड शिफ्टच्या मावशी आलेल्या दिसल्या. त्यांना बिनधास्त विचारलं- ” मावशी, डब्यात काय आणलंय?”
मावशीनं प्रेमाने उत्तर दिलं- “सर, आज कांद्याची भाजी आणि चटणी भाकर हाय डब्यात. भाज्या लयी महाग झाल्यात. ”
मी तिला “सर्जनस रूममध्ये डबा घेऊन ये, ” म्हणालो. भूक अनावर झाली होती.
तिने एक छोटासा स्टीलचा डबा आणि कागदाची वळकटी तिच्या पिशवीतून काढून माझ्या पुढ्यात दोन्ही मांडले.
त्या कागदाच्या वळकटीत 4 घट्ट रोल केलेल्या ज्वारीच्या भाकऱ्या होत्या. स्टीलचा डबा उघडला, तर तिखट तांबड्या रंगाची तेलात परतलेली कांद्याची भाजी आणि एका कोपऱ्यात हिरव्या मिरचीचा ठेचा होता. त्या अन्नावर मी अक्षरशः तुटून पडलो. ती भाजी भाकरी, ठेचा अमृताहूनी गोड लागत होता. बघता बघता दीड भाकरी डीचकली, आणि मावशीने आणलेल्या गार पाण्याचा ग्लास गटागटा प्यायलो. तेव्हा कुठे पोट शांत झाले.
भाकरी!काय ताकद आहे ह्या अन्नात!
भाकरीला न तुपाचे, तेलाचे लाड. बनवताना तिला धपाटे घालुन, डायरेक्ट विस्तवावर भाजणे. कुठे पोळपाटाची शय्या नाही, की लाटण्याचे गोंजरणे नाही की तव्याचे संरक्षण नाही. भाजीचा आगाऊ हट्ट न करणारी, चटणीलासुद्धा तेवढ्याच प्रेमाने कुशीत घेऊन पोट भरणारी ही माऊली. कित्येक चुलींवर ही भाकरीच फक्त पोट भरण्याचे काम करते.
काय सामर्थ्य आहे ह्या भाकरीचे!
कष्ट करणाऱ्या मंडळींचे साधे, कष्टाळू अन्न.
कुठेतरी, रस्त्याच्या कडेला, तान्हे मूल कापडी पाळण्यात बांधून, कित्येक माऊलींच्या ममतेची ही भाकरीच पोशिंदी. ह्या भाकरीच्याच जीवावर, रस्ते, बिल्डिंगस, सोसायट्या, बंगले उभे आहेत. त्या भाकरीच्या प्रत्येक घासात, कष्टाचा सुगंध आणि गोडवा जाणवतो.
ती कांद्याची भाजी म्हणजे भुकेने व्याकुळ झालेल्या जिवाला पर्वणीच.
त्या माउलीला पोटभर आशीर्वाद दिले.
त्या भाकरीमध्ये कष्ट करणाऱ्याचेच पोट भरण्याची क्षमता असते. कष्ट करणाऱ्या हातांनाच त्या भाकरीचा घास तोडण्याची ताकद असते. त्या माउलीला तिचा डबा पुढे करण्याची उदारता त्या भाकरीनेच बहाल केली असावी. त्या भाकरीमध्ये केवळ पोट भरण्याचे सामर्थ्य नसून, कष्ट करणाऱ्या व्यक्तीमध्ये कणखरता, चिकाटी, आत्मबळ आणि सोशिकता निर्माण करण्याचे अद्भुत रसायनदेखील असते. भाकरी केवळ खाद्य पदार्थ नसून, जीवनशैलीचे, संस्कृतीचे प्रतीक आहे.
उगाच जिभेचे फाजील चोचले न करणारी, दंतपंक्तीला भक्कम करणारी, पोट भरण्याची विलक्षण संपन्नता असणारी ही भाकरी म्हणजे खऱ्या अर्थाने पूर्णब्रह्म आहे.
मला जेव्हा जेव्हा शक्य होते, तेव्हा तेव्हा मी मावशी- मामांच्या जेवणात घुसखोरी करतोच. त्यांच्या स्वयंपाकामध्ये प्रामाणिक कष्टाची रुचकरता तर असतेच, पण त्यांच्या चेहऱ्यावरची चार घास वाटून खाण्याची उदार भावना, प्रेम, हे खरोखर मनाला स्पर्शून जाते आणि ते दोन घास खरेच स्वर्गीय आनंद देऊन जातात. त्यांच्या डब्यातल्या भाकरीची बातच काही और आहे.
खाऊन झाल्यावर डोळ्याच्या कडा ओलावल्या. तो मेला कांदा कितीही शिजवला, तरी डोळ्यात पाणी आणतोच.
☆
लेखक :डॉ दीपक रानडे
प्रस्तुती : अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
☆ आनंदी जीवनासाठी, लिमिटेड होतं तेच बरं होतं – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी☆
☆
पूर्वी बहुतांश गोष्टी लिमिटेड होत्या व त्यामुळे आपले आयुष्य किती सुखी होते बघा…..
टी.व्ही.वर 1-2 channels होती व तीपण लिमिटेड वेळेसाठी. रात्री ठराविक वेळेनंतर बंद व्हायची व घरातील लोकं एकतर झोपायला जायची, नाहीतर छान गप्पा मारायची.
दोन चाकी वाहनांचे उत्पादन लिमिटेड होते, बुकिंग केल्यावर वर्षा-दीड वर्षाने वाहन मिळायचे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या लिमिटेड होती.प्रवासाचा आनंद मिळायचा.
गोडाधोडाचे पदार्थ फक्त सणासुदीला असायचे, तेपण लिमिटेड. त्यामुळे स्थूलतेचे प्रमाण कमी होते.
शाळांमध्ये लिमिटेड अभ्यास असायचा. त्यामुळे मुलांना खेळायला वेळ मिळायचा व मुलांची मानसिक व शारीरिक जडणघडण नीट व्ह्यायची.
बहुतांश ठिकाणी वर्किंग अवर्स लिमिटेड होते, संध्याकाळी ५-६ च्या दरम्यान ऑफिसेस बंद व्हायची व माणसे वेळीच घरी पोहोचून कुटुंबासाठी वेळ द्यायची.
अशा अजून अनेक गोष्टी आहेत ज्या लिमिटेड होत्या. त्यामुळे आपले आयुष्य खूप सुखी होते.
पण आता सगळंच अनलिमिटेड झालंय.आणि त्यामुळे जीवनातील सुख मात्र खूपच लिमिटेड झालंय !
“बाबा, तुमच्या लहानपणी आणि आता आमच्या लहानपणी काय काय बदल झालेले वाटतात?”
“बेटा, काळ खूप बदलला बघ.
तेव्हा पोरांच्या छातीच्या बरगड्या दिसायच्या आणि पोट अगदी पाठीला टेकलेले दिसायचे. आता चौथीपाचवीच्या पोरांचीपण सुटलेली पोटे दिसतात.
तेव्हा पोरं दिवसभर खेळून खेळून रात्री बिछान्यावर अंग टाकले की गाढ झोपत. आता पोरं दिवसभर बसून ‘कॉम्प्युटर गेम्स’ खेळून रात्री late night movies एन्जॉय करत जागत बसतात.
तेव्हा आमच्या घरात फक्त आजी आजोबांच्या डोळ्याला चष्मा असायचा. आता दुसरीची मुलं नाकावरील चष्मे सावरत शाळेत बसतात.
तेव्हा वडिलांचा आम्हाला फार धाक असायचा. आता पोरं नाराज होऊ नयेत म्हणून त्यांचे डॅड, त्यांना ते म्हणतील तेव्हा हॉटेलात नेऊन, ते म्हणतील ते खाऊ घालतात.
तेव्हा आम्हाला कधीतरी सणावाराला केलेली पुरणपोळी गोड लागायची. आता मुलांना दररोज झोपेतून उठल्यावर आई मागे लागून खाऊ घालते ते अंजीर, पिस्ते, मनुका पण बेचव लागतात.
तेव्हा आमच्या वाढदिवसाला आई एखादा बेसनाचा लाडू हातावर ठेवायची. आता मुलांच्या वाढदिवसाला, तोंडाला फासण्यासाठी एक आणि खाण्यासाठी एक असे दोन मोठे केक्स लागतात.
मुळात काय की,
तेव्हा आम्हाला फार काही मिळत नसतानाही आनंदात जगता यायचं
आता
बरंच काही मिळत असूनही आनंदी जीवन कसे जगावे यावरील सेमिनर्स अटेंड करावे लागतात.”
☆
लेखक: अज्ञात
प्रस्तुती :सौ. शीतल कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈