मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “स्वभाव राशींचे आणि पदार्थांचे.” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “स्वभाव राशींचे आणि पदार्थांचे.” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

माणसांचे भिन्न स्वभाव असतात, वैशिष्ट्ये असतात.  तसेच पदार्थांचे असते.

इडली– ( जगन्मित्र कर्क)

ही मवाळ प्रवृत्तीची.  अगदी लहान बाळापासून वृद्धापर्यंत कुणाशीही दोस्ती करणारी आणि कुणाबरोबरही संसार थाटणारी. 

तिला सांबाराचा संग चालतो नि चटणीचीही चटक लागते. लोण्याबरोबर नि लोणच्याबरोबर तिचं तितक्याच आनंदाने जमतं. तुपाबरोबर नि दूध-गुळाबरोबरही ती सुखाचा संसार थाटू शकते.

कधी कुणाला ठसका लावणार नाही नि कधी कुणाला रडवणार नाही.

_पण एक नंबरची लहरी बरं का ही!

कधी आनंदाने फुलेल तर कधी रुसून चपटी होऊन बसेल. 

मिसळ — (जहाल मेषरास)

मिसळीचं अगदी उलटं.  ही जहाल मतवादी पक्षाची सदस्या! हिच्यात मवाळपणा औषधालाही मिळणार नाही.  फक्त तरुणांची सोबत हिला आवडते.  बालके नि वृद्ध  हिच्या आसपासही फिरकू शकत नाहीत.

रूपानं देखणी, लालबुंद वर्णाची ही ललना  केवळ दर्शनाने नि गंधाने  लाळ गाळायला लावते. पण हिचा स्वभाव असा तिखट की खाणारा कितीही मर्दानी गडी असला तरी पहिल्या घासाला ठसका लागणार, ही काळ्या दगडावरची रेघ!

भेळ  (चटकदार मिथुन रास)

नटरंगी…. चिंचेच्या चटणीचा आंबटगोडपणा, कांदा-कोथिंबिरीचा स्वाद, फरसाणाचा खमंगपणा, मिरची ठसका लेवून पातेल्यात नाचली की पब्लिकने शिट्ट्या मारत भोवती पिंगा घातलाच पाहिजे.

उप्पीट नि पोहे (जगावेगळी कुंभरास)

हे दोघे “सामान्य जनता”  या वर्गाचे वाटणारे पण सर्वार्थाने असामान्य. कारण  यांच्या वाट्याला  कौतुक येते पण  टीका मात्र कधीही येत नाही. तसेच ही जोडी लहान, थोर, आजारी आणि सगळ्या भारतवर्षाला चालणारी. महत्त्वाचे म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र यांपैकी कोणताही प्रहर यांना वर्ज्य नाही.

पैशाची मुजोरी या द्वयींना नसल्याने गरिबांपासून श्रीमंतांच्या मुखात हे तितक्याच आनंदाने रमतात.

गोडाचा शिरा  (नशीबवान वृषभ)

हे  मात्र जरा खास व्यक्तिमत्त्व… खास प्रसंगांना उपस्थित राहणारं!

सत्यनारायणाचा प्रसाद होण्यासारखं भाग्य वाट्याला आल्यानं हा शिरा अगदी  नशीबवान.. आणि बाळंतिणीच्या खाद्यविश्वातही अधिकारानं शिरलेला हा “शिरा”.

महाराष्ट्रात हे रव्याचं लेकरू शिरा म्हणून जन्मलेलं तर उत्तरेकडील कणकेचं बाळ “कडा प्रशाद” नावाचं. तर कुठे “सुजी हलवा” नावानं मिरवणारं…

वडा, भजी— (व्यवहारचतुर तूळरास)

हे पदार्थांमधले हिरो व लोकप्रिय…

पोट भरलेल्यालाही स्वत:कडे आकर्षित करणारे.  हे दिसले की लोक यांच्याभोवती जमा नाही झाले तरच नवल!

पावाशी  लगीनगाठ बांधून पावाचं नशीब उजळवलं ते याच द्वयींनी!

पावभाजी – ठसा आणि ठसका म्हणजे धनुरास)

सगळ्यांना सामावून घेणारा हिचा स्वभाव!  बटाटा, कांदा, ढबू मिरची, वाटाणा, टोमॅटो, मिरची, आलं, लसूण, फ्लॉवरसारख्या सगळ्या भाज्या, सगळे मसाले, तेल, लोणी यांना एकत्र कुटुंबात गुण्या-गोविंदाने नांदवून आपल्या स्वत:च्या चवीचा ठसा उमटवणारी, खाद्यविश्वात नाकामागून येऊन तिखट झालेली ही खाद्यसुंदरी!

गोड पदार्थांची स्वभाव विशेष दुनियाही अशीच रंगरसीली!  प्राचीन काळापासून अख्ख्या भारतवर्षाची लेक म्हणजे क्षीर ऊर्फ खीर!* ( सोज्वळ मीनरास)

अगदी सोज्ज्वळ पण विविध पोषाखांची आवड असणारी.

कुठे शेवया, कुठे गव्हले, कधी तांदुळाच्या रूपाने पायसम् झालेली तर कधी गव्हाळ वर्णी हुग्गीचं रूप ल्यालेली!

शुभकार्य असो की दिवसकार्य ही हजेरी लावणारच…

“मी खीर खाल्ली असेल तर बुड घागरी” म्हणत बालपणीच परिचित झालेली ही फारशी आवडतही नाही नि नावडतही नाही….. पण नसली तर मात्र नाडवते.

लाडू– ( खानदानी सिंहरास)

हा चराचरातून तयार होणारा दिमाखदार. तूप आणि साखर हे खानदानी याचे प्रमुख कुटुंबीय. हे कुटुंबीय भाजलेल्या बेसनात घालून जन्मणारा बेसन लाडू हा टाळ्याला चिकटून फजिती करणारा. 

▪︎बुंदीचा लाडू शुभकार्यात भाव खाऊन जाणारा.

▪︎रव्याचा लाडू आपला असाच नारळ घरात आला तर जन्मणारा नि  लक्षात येण्याआधी संपून जाणारा..

▪︎साध्या पोळीपासून ते  राजेशाही डिंकापर्यंत  कोणत्याही रूपात सादर होण्याची किमया लाडूच करू जाणे!

हा बच्चेकंपनीचा लाडका!

पुरणपोळी– (नाजुक-साजुक कन्यारास)

ही पक्वान्नांची राणी!

नाजुक-साजुक स्वभावाची..

महाराष्ट्राची नि कर्नाटकाची ही कन्या प्रत्येक सणाची अगदी लाडकी. पण हिच्याशी वागताना थोडी जरी चूक झाली तरी हिचा पापड मोडलाच म्हणून समजा!

जिलेबी — (कुर्रेबाज, गूढ वृश्चिक)

नटरंगी…. पण बिनभरवशाची… कधी आंबट तर कधी गोड..

आज कुऱ्यात असणारी कुरकुरीत,

पण नाराज होऊन कधी मान टाकेल ते सांगता येत नाही. पण लग्नाच्या पंगतीची हिला भारी हौस…

गुलाबजाम  (जिगरबाज मकर)

वर्ण विविधा असला तरी अंगी गुण असले की साऱ्यांचे आपण लाडके होतो… हे शिकवणारा! दैवायत्तं कुले जन्म:, मदायत्तं तु पौरुषं चा जिगरबाज महामंत्र देणारा.

असे स्वभाव राशींचे.

चला पटकन तुमची रास सांगा.

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ भाऊराया – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

भाऊराया – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी 

कोण म्हणतं बहीण

ओवाळणीसाठी ओवाळते

भावासाठी बिचारीचे

अंतःकरण तळमळते ।।

*

भाऊरायाच्या रूपाने

माहेर येतं घरी

म्हणून येतात काळजात

आनंदाच्या सरी ।।

*

या निमित्ताने तिला वाटतं

भावाशी खूप बोलावं

माहेरच्या फांदीवर

क्षणभर तरी डोलावं ।।

*

कशी आहेस? एवढाच प्रश्न

सुखावून जातो

दुःखातसुद्धा एखाद-दुसरा

आनंद अश्रू येतो ।।

*

साडी आणली का नोट

कोणी पहात नाही

भाऊ दिसेपर्यंत तिला

घास जात नाही ।।

*

लग्न होऊन सासरी जाणं

खूप कठीण असतं

बाप नावाच्या आईला

सोडून जायचं असतं ।।

*

उपटलेल्या रोपट्यासारखं

सोडावं लागतं माहेर

जन्मदात्या आईकडून

स्वीकारावा लागतो आहेर ।।

*

वाटतो तितका हा प्रवास

सहज सोपा नसतो

भावासाठी काळजात एक

सुंदर खोपा असतो ।।

*

रक्षाबंधन ,भाऊबीज हे

फक्त नाहीत सण

बहिणीसाठी ते असतं

समाधानाचं धन ।।

*

सुरक्षेचं कवच आणि

पाठीवरचा हात

बहिणींसाठी भाऊ म्हणजे

दुःखावरची मात ।।

*

कुणीतरी आपलं आहे

भावनाच वेगळी असते

म्हणून बहीण दाराकडे

डोळे लावून बसते ।।

*

रक्षाबंधन, भाऊबीज

दिवस राखून ठेवा

आईच्या माघारी बहीणच

आई असते देवा ।।

कवी :अज्ञात

प्रस्तुती :सौ. शीतल कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “स्वयंपाकातील शब्द आटले…” – लेखक : श्री संजीव साबडे ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “स्वयंपाकातील शब्द आटले…” – लेखक : श्रीसंजीव साबडे ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

मी ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये असताना रेणुका खोत माझी सहकारी होती. फेसबुकवर तिच्या अनेक पोस्ट असतात. एका पोस्टमध्ये तिने गमतीने ‘विसळुनी डोळे’ असा शब्दप्रयोग केला. ते वाचताना आपण हल्ली विसळणे हा स्वयंपाक घरातील शब्द वापरेनासे झाल्याचं जाणवलं.

पूर्वी जी भांडी घासायची नसत ती विसळत. म्हणजे चहाचा कप व बशी वगैरे. भांडी घासली जात. आता अनेक जण ‘भांडी धुतली’ असं म्हणतात. खरं तर ती घासून मग धुवायची असतात. कपडे धुवायचे असतात, लादी पुसायची असते. भाजी चिरायची असते. आता ती कापली असं म्हणतात. चिरण्यासाठी विळी लागते, काही विळींना नारळ खवण्याची सोय असे. सुरी कापण्यासाठी. फळं कापली जातात. तिचाही उल्लेख चाकू होतो बऱ्याचदा.

पालेभाज्या ‘निवडून’ ठेवत, आता त्या ‘साफ करतात’. शेंगा, मटार, कणीस सोललं असंही ऐकू येत नाही फारसं. पूर्वी चिरलेली वा निवडलेली भाजी ‘निथळत’ ठेवत. देठ हा शब्द आता फक्त ‘पिकल्या पानांचा देठ की हो हिरवा’ या गाण्यातच राहिलाय.

‘चहाचं आधण’ हाही शब्दही गायब झाला. पूर्वी ‘दूध उतू येत’ असे, आता ते ‘वर’ येतं. तेव्हा ते पातेलं खाली उतरवलं नाही तर दूध आटतं, पातेल्याला लागतं आणि काही वेळा करपतं. ताकासाठी दही रवीने घुसळत, आता दह्याचं ताक केलं म्हटलं जातं आणि दह्याची बरणी नसते. चहात साखर, आमटी वा भाजीत मीठ मिसळू दे, असं फार कोणी म्हणत नाही. ‘परतताना’ भाजी ‘हलवतात’, आमटी किंवा पातळ भाजी डावाने ‘ढवळतात’.

चिनी मातीची बरणी खूप कमी घरात असते. पूर्वी लोणी कढवून तूप केलं जात असे. दही लावण्यासाठी विरजण नसेल, तर ते शेजारून आणलं जाई. कढवणे, कढ येऊ देणे, विरजण, केर या शब्दांचा वापर शहरात खूपच कमी झाला आहे.

मसाल्यांच्या डब्याला ‘मिसळणीचा’ किंवा ‘मिसळणाचा डबा’च म्हटलं जाई. चमचे, पळी, डाव, झारा, उलथणं याला आता ‘चमचाच’ म्हणतात. पातेले ऐकू येत नाही. त्यालाच ‘भांडं’ म्हटलं जातं. पेला शब्द तर जणू हद्दपारच झाला. काही घरात वाटीला ‘बाउल’ म्हणतात. पूर्वी घरात खल-बत्ता, पाटा-वरवंटा व काही घरात रगडा असे. आता तो नसतो आणि ते स्वाभाविक आहे आणि असले तर ते अडगळीत पडलेले असतात. पाखडण्यासाठी लागणारं सूपही नसतं शक्यतो. पीठ चाळण्यासाठीची चाळणी नसते.

हे सारं ‘विसळुनी डोळे’ मुळे झालं. तरी हे फक्त स्वयंपाक घरातील. त्याखेरीज विंचरणे, भांग पाडणे असे वेगळेच. अडगळीत गेलेले असे अनेक शब्द तुम्हालाही आठवत असतील. ते तुमच्या घरी वापरात असतील, तर उत्तमच! हे शब्द आटता कामा नयेत.

लेखक: श्री संजीव साबडे

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ झाडाझडती… – लेखिका: सौ. नीलिमा जोशी ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ झाडाझडती…– लेखिका: सौ. नीलिमा जोशी ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित

घरात आम्ही दोघंच रहातो. दोघंही ज्येष्ठ नागरिक. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. त्यामुळे वादाचे तसे विषय आमच्या दोघात आताशा फारसे उदभवत नाहीत. पण एक रंजक प्रसंग मात्र आमच्या घरी आठवड्यातून एकदा अगदी न चुकता घडतो.

आमचा दोघांचाही आहार पहिल्यापासूनच बेताचा. त्यात वयपरत्वे ताव मारून जेवण्यात फारसा रस नाही उरलाय.

पण स्वयंपाक करण्यातला माझा रस मात्र अजूनही टिकून आहे.

चारी ठाव स्वयंपाक करून असं डावी उजवी बाजू भरलेलं ताट बघितलं की माझी भूक चाळवते. त्या उलट माझ्या नवऱ्याचं मत… त्याची भूक म्हणे मरते. एवढे पदार्थ बघून.

“पण स्वयंपाक माझा प्रांत आहे तेव्हा खाण्यापुरतं तू ‘तोंड’ उघड”, असं सांगून मी पदार्थ बनवतेच.

कोकणस्थी बाण्याने कितीही मोजून मापून स्वयंपाक केला ना, तरी अगदी थोडं काहीतरी उरतंच.

ते धड कामवाल्या बाईंना देण्याएवढंही नसतं.

मग ‘खाऊ संध्याकाळी’ म्हणून फ्रीजमध्ये दडपलं जातं.

मग आठवड्यातून एक दिवस फ्रीजची झाडाझडती घेण्याचं काम माझा नवरा आवर्जून करतो. त्यायोगे माझ्यावर टोमणे मारायला त्याला संधी मिळते बहुधा.

एक मोठ्ठी पिशवी घेऊन तो झाडाझडतीत सापडलेलं टाकून देण्यासाठी सज्ज होतो.

खरंतर मला खूप वाईट वाटतं, अन्न वाया गेलेलं पाहताना. पण नाईलाज असतो हो. दोन चार चमचेच उरलेलं असलं तरी पोटात ढकलून संपवायची क्षमता संपलीय हो.

पण ही झाडाझडती तो खूप रंजकतेने करतो, म्हणून बोच थोडी बोथट होते.

एक एक वाटी रिकामी करताना तो पुटपुटत असतो.

“सोमवारची कोबीची भाजी!

या या बाहेर. सुकलात कशाने हो.. आमच्या गृहमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं का? तुमची बदली करीन पराठ्यात म्हणून..

जाऊ दे हो.. मंत्र्याचं आश्वासन ते.. पाळतात थोडे…

ओहो… मंगळवारची आमटी का? तुमची बदली नक्कीच ! गडचिरोलीला होते ना तश्शीच.. !!. फ्रीजमधून कचऱ्याच्या डब्यात.

 मागनं कोण डोकावतंय?

मुगाच्या डाळीची खिचडी वाटतं.. ?. काय हो तुम्ही बुधवारच्या ना.. ?. या या… बिरबलाच्या खिचडीसारखीच गत झालीय हो तुमची. ती पकली नाही. ही संपली नाही… शेवट कचऱ्याच्या डब्यात!

अरे वा… गुरुवारचं काहीच उरलं नाहीये… दत्ताची कृपाच म्हणायची… आत्ता आठवलं… बाहेर गेलो होतो जेवायला.. “

“एक खण झाला गं. ” हे माझ्याकडे बघत खिजवल्यासारखं हसत.

“ऊतच आलाय बाबा!… अगं, तुला नाही म्हटलं.. या शुक्रवारच्या कढीला ऊत आलाय… टाकू ना गं?

हे शेवटचं भांडं दिसतंय.. शनिवारची अळूची भाजी… फारच चविष्ट झाला होतात हो तुम्ही. पण.. फदफदं की हो झालं तुमचं !

रविवारच्या स्वयंपाकाचं भाग्य थोर.. जरा हटके मेनू असल्यामुळे आम्ही संपवतो. किंवा एखादा पाहुणा असतो शेअर करायला. “

थोडसं ओशाळत मी ही हसण्यावारी नेते त्याचा हा उपक्रम.

त्या निमित्ताने पुढच्या आठवड्यासाठी फ्रीजमधे जागेची सोय होते ना..

यातला गमतीचा भाग सोडा… थोड्या बहुत फरकाने प्रत्येकाच्या घरातली ही कहाणी आहे. यात बरीचशी अपरिहार्यताही आहे.

पण यावरून स्फूर्ती घेत मी मनाशी ठरवते, या आठवड्यात सगळ्या कपाटांची आवराआवर करायची. पण लक्षात येतं की फ्रीज साफ करण्याएवढं हे काम सोपं नाहीये.

प्रत्येक वस्तूला एक एक आठवण बिलगून बसलीय. तिच्यातून अलगद निर्लेप राहत सुटका करून घेणं जमतच नाही मला.

काश्मीरहून पंचवीस वर्षांपूर्वी आणलेल्या शालीतल्या ऊबदार आठवणी परत शालीची घडी घालून कपाटाच्या कोपऱ्यात जातात.

तीच गत म्हैसूरहून आणलेल्या रेशमी साडीची होते.. विरत चाललीय तरी हळूवार स्पर्शाची आठवण तिलाही कपाटात माघारी धाडते.

मुलाचा एखादाच इवलासा कपडा मनाच्या तळाशी इतका सुखद पहुडलेला असतो की त्याला दूर करणं जमतच नाही…

आईची आठवण म्हणून ठेवलेली तिची साडी असूदे.. किंवा निरोप समारंभाला मिळालेली साडी असू दे.. आजीने विणलेला जीर्ण झालेला स्वेटर असू दे किंवा पहिल्या पगारातून घेतलेली पर्स…. कपाटातल्या आपापल्या जागेवर जाऊन स्थानापन्न होतात. आणि चिडून मी कपाट आवरण्याचा माझा उपक्रम गुंडाळून टाकते.

भांड्याकुंड्यांचं कपाट आवरायचंय. मिळालेल्या भेटवस्तूंना मार्ग दाखवायचाय. माळा आवरायचाय.. केलेल्या आर्थिक व्यवहाराची तपशीलवार नोंद करायचीय….. यादी तर न संपणारी असते…

स्वतःचा राग यायला लागतो… सुरुवातच इतकी डळमळीत करतो आपण की शेवटापर्यंत पोहोचतच नाही आपण.

म्हणून स्वत:चा उद्धार करायला लागते मी. आणि माझा फ्रीज साफ करणारा नवराच धावून येतो माझ्या मदतीला.

वातावरण हलकं करत सांगतो.. “अगं outsourcing चा जमाना आहे हा.. मला out source कर हे काम… बघ. बघता बघता तुझी कपाटं रिकामी करतो की नाही ते.

एकाने पसरायचं. दुसऱ्याने आवरायचं…

लेखिका: सौ. नीलिमा जोशी

प्रस्तुती : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कवीची कीर्ती.. चोराला उपरती!…” –  लेखक : श्री धनंजय कुरणे ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ “कवीची कीर्ती.. चोराला उपरती!…” –  लेखक : श्री धनंजय कुरणे ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक

वाचून आश्चर्यानं थक्क व्हावं, अशी  बातमी एका मित्रानं आज व्हाट्सअपवर पाठवली. आजच्या टाईम्समध्ये ती छापून आली आहे. बातमी आहे नेरळ मध्ये घडलेल्या एका विलक्षण घटनेबद्दल!

नेरळमध्ये राहणारे सौ. उषा आणि श्री गणेश घारे दहा दिवस गावाला गेले होते. गावाहून परत आल्यावर, ‘आपल्या घरात चोरी झाली आहे, ‘ हे त्यांच्या लक्षात आलं. घरातल्या काही वस्तू चोरीला गेल्या होत्या. मात्र एका खोलीच्या एका कोपऱ्यात घरातला LED टीव्ही पडलेला दिसला आणि शेजारी एक चिठ्ठी ठेवलेली दिसली…. ती चिठ्ठी दस्तूरखुद्द चोर महाशयांनी लिहिली होती…

त्यात लिहिलं होतं….

“मला माहिती नव्हतं की हे घर ‘कवी नारायण सुर्वे’ यांचं आहे. याबाबत मला आधी माहिती असतं तर मी हे घर फोडलंच नसतं आणि टी. व्ही. आणि इतर वस्तू चोरल्याच नसत्या!”

चिठ्ठीच्या शेवटी ठळक अक्षरात ‘SORRY’ असंही लिहिलं होतं.

सौ. उषा घारे या कवी नारायण सुर्वे यांच्या कन्या आहेत. सध्या त्या आपल्या पतीसोबत, नेरळला कै. नारायण सुर्वे यांच्या घरात रहात आहेत.

पोलिसांनी ‘चोराची चिठ्ठी’ ताब्यात घेतली आहे. दहा दिवसांच्या कालावधीत चोर अनेकदा या घरात आला असावा आणि एका खेपेदरम्यान त्याला ‘नारायण सुर्वे’ यांचं पोर्ट्रेट व फोटो दिसले असावेत… ‘आपण एका लोकमान्य कवीच्या घरी चोरी केली, ‘ याची त्याला खंत वाटली असावी, म्हणून त्यानं चोरलेला टीव्ही परत आणून ठेवला असावा, असा पोलिसांचा कयास आहे…. ‘ चोर फारसा शिकलेला नसावा हे त्याच्या बाळबोध लिखाणावरून सिद्ध होतं, ‘ असा पोलिसांचा अंदाज आहे.

घटना तशी छोटी पण असामान्य आहे. नारायण सुर्वे यांचा मृत्यू होऊन चौदा वर्षं झाली आहेत. पण त्यांच्या कीर्तीचं गारुड आजही असं आहे, की एका चोरालाही आपल्या कृत्याची उपरती व्हावी! व्वा! वाचून खूप छान वाटलं.

पाश्चिमात्य देशात साहित्यिकांना कसा मान मिळतो, याबाबतची हकीकत एका मित्राकडून पूर्वी ऐकली होती…. तो एकदा फ्रान्सच्या टूरला गेला होता. एका ठिकाणी जात असताना, हायवेवर एका विशिष्ट ठिकाणी सर्व गाड्या एकदम ‘स्लो’ होत होत्या आणि अगदी ‘वीसच्या स्पीडनं’ जात होत्या. मित्रानं टूर गाईडला याबद्दल विचारलं. तेव्हा तो म्हणाला, ” इथे हायवेच्या शेजारी आमच्या देशाला साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळवून देणारा एक लेखक राहतो. ‘त्याच्या सध्याच्या लेखनात व्यत्यय नको म्हणून सर्व गाड्या हळू चालवाव्या’ असं आवाहन सरकारनं केलं आहे!” हे ऐकून मी अक्षरशः उडलोच होतो.

आजची नेरळमधली बातमी वाचूनही अगदी अशीच अवस्था झाली.. मला वाटतं नारायण सुर्वेना आयुष्यात अनेक मान – सन्मान, पुरस्कार मिळाले असतील.. पण आजचा हा पुरस्कार फारच ‘वरच्या दर्जाचा’ आहे..

या ‘साहित्यप्रेमी’ चोर महोदयांमुळे ‘मजबूर’ सिनेमातला एक संवाद आठवला…

अमिताभ प्राणला म्हणतो,

“मायकल, सुना हैं कि चोरों के भी उसूल होते हैं!”

त्यावर प्राण म्हणतो,

“ठीक सुना हैं तुमने… चोरों के ही तो उसूल होते हैं!”

लेखक : धनंजय कुरणे

संग्राहक  : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भाऊ- बहिणी… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

निरनिराळ्या लोकांनी सांगितलेल्या खोट्या गोष्टी… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर 

१) बस कंडक्टर ने सांगितलेली खोटी गोष्ट- मागची गाडी रिकामी आहे, त्यात बसा

२) आईबाबांनी सांगितलेली खोटी गोष्ट- फक्त दहावीपर्यंत अभ्यास कर, नंतर मज्जाच मज्जा

३) सर्वांनीच सांगितलेली खोटी गोष्ट- घर, गाडी आपण एकदाच घेतो, त्यामुळे पैशाचा विचार करू नको

४) नव्याने नोकरीला लागलेल्या मित्राने सांगितलेली खोटी गोष्ट- पगार कमी आहे, पण शिकायला खूप मिळतं

५) बॉसने प्रमोशन नाकारताना सांगितलेली खोटी गोष्ट- मी तुझ्यासाठी खूप भांडलो, पण काही उपयोग झाला नाही

६) मुलगी बघायला गेल्यावर तिच्या घरच्यांनी सांगितलेली खोटी गोष्ट- आमची मुलगी खूप शांत स्वभावाची आहे

७) मुलाने लग्नाआधी मुलीला सांगितलेली खोटी गोष्ट- मी Occasionally ड्रिंक्स घेतो

८) पारितोषिक वितरणाच्या वेळी परीक्षकांनी सांगितलेली खोटी गोष्ट- माझ्यासाठी सर्वच जण विजेते आहेत

९) कपड्याच्या दुकानातील सेल्समनने सांगितलेली खोटी गोष्ट- हा रंग तुमच्यावर उठून दिसतोआणि सर्वात कळस म्हणजे

१०) नवर्‍याने बायकोला सांगितलेली खोटी गोष्ट – तू माहेरी गेलीस की मला मुळीच चैन पडत नाही.

सर्वच खोटं.. पण खरंय..

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “उपदेश करु नका…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “उपदेश करु नका…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

मी जर महाभारत काळात जन्माला आलो असतो तर माझा समावेश कौरवांच्या पार्टीतच झाला असता.

कारण..

श्रीकृष्णाची कधी प्रत्यक्षात गाठ पडलीच तर मी त्याला एकमेव प्रश्न हा विचारेन की…

” देवाधिदेवा…, भगवतगीता अर्जुनाला सांगण्याऐवजी, दुर्योधनाला आणि दु:शासनाला सांगितली असतीस तर हे महाविनाशी युध्द टाळता आले असते ना ?

इतका मोठा संहार झाला नसता. तू असे का केले नाहीस ?

भगवद्गीतेचे  हे दिव्य ज्ञान कौरवांना झाले असते तर महाभारत हे, युद्धाच्या तत्त्वज्ञानाऐवजी बंधुभावाच्या, प्रेमाच्या तत्त्वज्ञानाची शिकवण देणारे झाले नसते का ?”

सध्यातरी कृष्णाने प्रत्यक्ष दर्शन देणे शक्य नव्हते. त्यामुळे  इंटरनेटच्या जंजाळात मी हा प्रश्न प्रसृत केला. बघताबघता हा प्रश्न प्रचंड व्हायरल झाला. फेसबुक, whatsapp, quora, युट्युब सगळीकडे या प्रश्नाने धुमाकूळ घातला. आणि अखेरीस इतके ट्रॅफिक ओसंडल्यामुळे प्रत्यक्ष श्रीकृष्णाला त्याची दखल घ्यावी लागली.

आणि… एके दिवशी मला श्रीकृष्णाचा व्हिडीओ कॉल आला.

अक्षयकुमार आणि परेश रावलचा OMG बघितलेला असल्यामुळे, श्रीकृष्ण अगदी साध्या वेशभूषेत येणार, हे मला अगोदरच ठाऊक होते.

थेट स्वर्गातून, पृथ्वीवर कॉल लावलेला असल्यामुळे, खूप डेटा खर्च होत असणार, त्यामुळे श्रीकृष्णाने थेट मुद्द्याला हात घातला.

“ वत्सा, कशाला इतके अवघड प्रश्न नेटवर टाकतोस ? सगळे ट्रॅफिक जाम झाले. ”

“ देवा, हा अखिल मानवजातीच्या मार्गदर्शक धर्मग्रंथाचा प्रश्न आहे. तुम्ही हे युद्ध टाळण्यासाठी हे ज्ञान कौरवांना दिले असते तर युध्दच झाले नसते.. हा प्रश्न इंटरनेटच्या  ट्रॅफिकपेक्षा कितीतरी महत्त्वाचा नाही का ?”

“मला उपदेश करू नकोस”  ………. श्रीकृष्णांचा एकदम बदललेला स्वर ऐकून मी भांबावलो.

“ देवा, माझी काय बिशाद तुम्हाला उपदेश करण्याची! “…. मी गयावया केली.

“ वत्सा, … अरे तुला नाही म्हणालो. ”

… मला हायसे वाटले.

“ ‘मला उपदेश करू नका’… असे दुर्योधन मला म्हणाला होता.

… तुला काय वाटते ? मी हे युध्द टाळण्यासाठी  दुर्योधनाकडे गेलो नसेन ?

भगवद्गीतेमधील न्याय अन्याय, नैतिकतेच्या गोष्टी त्याला सांगितल्या नसतील ?”

“ काय सांगताय देवा ? दुर्योधनाला प्रत्यक्ष तुम्ही गीतेचे ज्ञान सांगूनदेखील त्याला ते कळले नाही ? तो सरळसरळ तुम्हाला ‘उपदेश  करू नका’ म्हणाला ?”

“ वत्सा, अगदी असेच घडले बघ.

दुर्योधन म्हणाला….. ‘मला चांगले-वाईट, पाप-पुण्य, नैतिक-अनैतिक या सगळ्याचे ज्ञान आहे. सद्वर्तन आणि दु:वर्तन यातील फरकही मी जाणतो, त्याचा उपदेश मला करू नका ‘.

वत्सा, पाप काय आहे हे दुर्योधनच काय तुम्हीसुद्धा जाणता.. पण त्यापासून दूर रहाणे तुम्हालाही जमत नाही. अनैतिकता म्हणजे काय हे दुर्योधनही अन् तुम्हीही ओळखता, पण टाळत नाही.

तुमच्यासाठी चांगले काय आहे आणि वाईट काय आहे, हे तुम्ही जाणता, पण तुम्ही वाईटाचीच निवड करता. दुर्योधनाने स्वत:च्या वर्तनाची अगतिकता सांगून बदल नाकारला, त्याने स्वत:चा ‘नाकर्तेपणा’ ढालीसारखा वापरला”.

आता मात्र मला दुर्योधनाच्या जागी माझा चेहरा दिसायला लागला.

“ मला उपदेश करू नका“…… वडिलांना उद्देशून हे वाक्य मी शंभरवेळा उच्चारले असेन.

मित्रांबरोबर उनाडक्या करणे, चुकीचे होते हे मला माहीत होते, पण मी त्याचीच निवड करीत होतो. आणि वडिलांना, “उपदेश करू नका” असे सांगत होतो.

सकाळी लवकर उठून व्यायामाला जाणे माझ्या फायद्याचे होते हे मला ठाऊक होते. पण अंथरुणात लोळत पडणे हे माझे वर्तन होते, आणि “लवकर उठत जा” असे सांगणाऱ्या  आईला, “उपदेश करू नकोस” असे सांगणारा “दुर्योधन” मीच होतो.

“तंबाखू खाऊ नका, दारू पिऊ नका, मांसाहार करू नका “, हे उपदेश आम्हाला ऐकायचे नाहीत. त्यामुळे शरीराचे नुकसान होते, हे आम्हाला ठाऊक आहे. पण त्याची अंमलबजावणी आम्हाला करायची नाही. कारण आम्ही ‘दुर्योधन’ आहोत. आम्ही कौरव आहोत.

अर्जुन आणि दुर्योधनात हाच फरक होता की, दुर्योधनाने समजत असूनही स्वत:चे वर्तन बदलले नाही आणि अर्जुनाने स्वत:चे वर्तन श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून बदलले…

संस्कार, प्रकृती, राग, श्रेय, प्रिय, प्रतिक्रिया, कर्म, विषय…. याबद्दलच्या संकल्पना जाणून घ्या.

कधीतरी स्वत:च्या आतल्या श्रीकृष्णाला प्रश्न विचारा…… तरच भगवदगीता वर्तनात येईल… वाचण्याची इच्छा होईल. इच्छा होईल तोच  सूर्योदय.

सध्यातरी मी कौरव नंबर ‘१०१’ आहे….

 

.. तुम्ही? 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ फुटलेला थर्मामिटर आणि वारी… लेखक : श्री राजेंद्र वैशंपायन ☆ प्रस्तुती – श्री मंगेश जांबोटकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ फुटलेला थर्मामिटर आणि वारी… लेखक : श्री राजेंद्र वैशंपायन ☆ प्रस्तुती – श्री मंगेश जांबोटकर ☆

आज आमच्याकडे असलेला पाऱ्याचा थर्मामीटर चुकून फुटला. आणि त्यातला पारा जमिनीवर बारीक बारीक थेंब होऊन पसरला. थर्मामीटरच्या काचांचे तुकडे नीट व्यवस्थित गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावल्यानंतर माझा मोर्चा मी पाऱ्याकडे वळवला. मी हळू हळू एकेक थेंब एकत्र करायला लागलो. पाऱ्याची एक विशेषता असते. पाऱ्याचा एक थेंब दुसऱ्याजवळ नेला की क्षणार्धात ते दोन थेंब एकत्र येऊन त्याचा एक मोठा थेंब बनतो. या पद्धतीने मी एकेक थेंब करून सगळा पारा एकत्र केला आणि शेवटी एका कागदाच्या पुडीत हळुवारपणे ठेऊन दिला.

पाऱ्याचा संदर्भात निरीक्षण करताना काही गोष्टी लक्षात आल्या. पहिली गोष्ट म्हणजे पाऱ्याचा एक थेंब दुसया थेंबाव्यतिरिक्त इतर कुठल्याही पदार्थाला चिकटत नाही. दुसरी गोष्ट अशी की दोन थेंब जेव्हा क्षणार्धात एकत्र येतात त्यानंतर त्यांचं वेगळं अस्तित्वच राहात नाही. दोन थेंब मिळून एक मोठा थेंब तयार होतो, पुन्हा त्याच गुणधर्माचा. तिसरी गोष्टअशी की पुन्हा त्या थेंबावर अगदी हलका प्रहार केला तरी त्याचे अनंत थेंब होऊन ते पुन्हा सगळीकडे पसरतात आणि गंमत म्हणजे प्रत्येक पसरलेल्या थेंबाचे गुणधर्म पुन्हा तेच असतात.

मला हा पाऱ्याचा खेळ बघताना पंढरीच्या वारीचं आणि वारकरी मंडळींचं कोड थोडं सुटलं आणि काही गोष्टी लक्षात आल्या.

१. पाऱ्याचा त्या विखुरलेल्या थेंबांसारखे सगळे वारकरी सगळीकडे पसरलेले असतात. छोटे छोटे थेंब असले तरी त्यांचा गुणधर्म सारखा असतो तो म्हणजे विठ्ठलप्रेम.

२. वारीची वेळ झाली की इतर कुठल्याही गोष्टीला न चिकटता ते पंढरीच्या वाटेवर निघतात आणि दुसरा थेंब म्हणजेच दुसरा वारकरी दिसला की क्षणार्धात एक होऊन विठ्ठलभक्तीचा एक मोठा थेंब तयार होतो. वारीच्या वाटेवर असे एकेक थेंब मिळत जाऊन विठ्ठलभक्तांचा इतर कुठेच न लिप्तळणारा एक मोठा थेंब शेवटी पंढरपुरात निर्माण होतो.

३. त्या मोठ्या थेंबात प्रत्येक छोट्या छोट्या थेंबाचे गुणधर्म वेगळे दिसतच नाहीत. तिथे ना जात ना पात. तिथे असतो विठ्ठलनामाचा आणि विठ्ठलप्रेमाचा एकच गुणधर्म.

४. वारी नंतर विठ्ठलभक्तीच्या त्या मोठ्या थेंबातून पुन्हा बारीक बारीक थेंब निर्माण होऊन आपापल्या गावी परतत असले, तरी ते पसरतात त्या विठ्ठलप्रेमाचा एकच गुणधर्म घेऊन.

वारीचं हे कोडं उलगडल्यावर अजून एक गोष्ट लक्षात आली की वारकरी होणं सोपं नाही. कारण त्यासाठी विठ्ठलनामाचा आणि विठ्ठलप्रेमाचा गुणधर्म अंगी बाणायला लागेल आणि अधिक महत्त्वाचं म्हणजे पाऱ्यासारखं विठ्ठलनामाव्यतिरिक्त इतर सगळ्या सांसारिक कचऱ्यापासून पूर्ण अलिप्त व्हावं लागेल. जमेल ते मला?

लेखक :श्री. राजेंद्र वैशंपायन

प्रस्तुती :श्री. मंगेश जांबोटकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्मृतिगंध… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ स्मृतिगंध…– लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

*

मला आठवतंय,…

खूप मोठं होईपर्यंत आम्ही लहानच होतो !

सगळंच स्वस्त होतं तेव्हा, बालपण सुद्धा ….

भरपूर उपभोगलं त्यामुळे….

उन्हापावसात, मातीत, दगडात, घराच्या अंगणात, गावाबाहेरच्या मैदानात… कुठेही गेलं तरी बालपणाची हरित तृणांची मखमल

सर्वत्र पसरलेली असायची…

    

आता तसं नाही…

लहानपणीच खूप मोठी होतात मुलं !

खूप महाग झालंय बालपण…. !

   

पूर्वी आईसुद्धा खूप स्वस्त होती,

फुल टाईम आईच  असायची तेव्हा ती ……!

आम्हाला सकाळी झोपेतून उठवण्यापासून ते रात्री कुशीत घेऊन झोपवण्यापर्यंत सगळीकडे आईच आई असायची….

 

आता ‘मम्मी’ थोडी महाग झालीय

जॉबला जातेय हल्ली. संडेलाच अव्हेलेबल असते….!

 

मामाचे गाव तर राहिलेच नाही ….

मामाने सर्वांना मामाच बनवलं ….

प्रेमळ मामा आणि मामी आता राहिलेच नाहीत पूर्वीसारखे….

आधी मामा भाच्यांची वाट पहायचे ….

आता सर्वांना कोणी नकोसे झालेत ….

हा परिस्थितीचा दोष आहे …

  

मित्रसुद्धा खूप स्वस्त होते तेव्हा…

हाताची दोन बोटं त्याच्या बोटांवर टेकवून नुसतं बट्टी म्हटलं की कायमची दोस्ती होऊन जायची….

शाळेच्या चड्डीत खोचलेला पांढरा सदरा बाहेर काढून त्यात ऑरेंज गोळी गुंडाळायची आणि दाताने तोडून अर्धी अर्धी वाटून खाल्ली की झाली पार्टी… !

 

आता मात्र घरातूनच वॉर्निंग असते,

“डोन्ट शेअर युअर टिफिन हं !”

मैत्री बरीच महाग झालीय आता.

  

हेल्थला आरोग्य म्हणण्याचे दिवस होते ते ….!

 

सायकलचा फाटका टायर आणि बांबूची हातभर काठी एवढ्या भांडवलावर अख्ख्या गावाला धावत फेरी घालताना तब्येत खूप स्वस्तात मस्त होत होती…..

 

घट्ट कापडी बॉलने आप्पाधाप्पी खेळताना पाठ इतकी स्वस्तात कडक झाली की पुढे कशीही परिस्थिती आली तरी कधी वाकली नाही ही पाठ…

इम्युनिटी बूस्टर औषधं हल्ली खूपच महाग झालीत म्हणे ….!

  

ज्ञान, शिक्षण वगैरे सुद्धा किती स्वस्त होतं…..

फक्त वरच्या वर्गातल्या मुलाशी सेटिंग लावलं की वार्षिक परीक्षेनंतर त्याची पुस्तकं निम्म्या किंमतीत मिळून जायची…..

वह्यांची उरलेली कोरी पानं काढून त्यातून एक रफ वही तर फुकटात तयार व्हायची….

 

आता मात्र पाटीची जागा टॅबने घेतलीय,

ऑनलाईन शिक्षण परवडत नाही आज !

  

एवढंच काय, तेव्हाचे

संसारसुद्धा किती स्वस्तात पार पडले….

शंभर रुपये भाडं भरलं की महिनाभर बिनघोर व्हायचो. ..

सकाळी फोडणीचाभात/पोळी किंवा भात आणि मस्त चहा असा नाष्टा करून ऑफिसमध्ये जायचं, जेवणाच्या सुट्टीत (तेव्हा लंच ब्रेक नव्हता) डब्यातली भेंडी/बटाटा/गवारीची कोरडी भाजी, पोळी आणि फार तर एक लोणच्याची फोड…!

रात्री गरम खिचडी, की झाला संसार…

ना बायको कधी काही मागायची ना पोरं तोंड उघडायची हिंमत करायची…!

 

आज सगळंच विचित्र दिसतंय भोवतीनं…!

Live-in पासून ते Divorce, Suicide पर्यंत बातम्या बघतोय आपण ….मुलं बोर्डिंगमधेच वाढतायत, सगळं जगणंच महाग झालेलं …..!

  

काल परवापर्यंत मरण तरी स्वस्त होतं…..

पण आता ….

 तेही आठ दहा लाखांचं बिल झाल्याशिवाय येईनासं झालंय….

   

म्हणून म्हणतोय… जीव आहे तोवर भेटत रहायचं.. आहोत तोवर आठवत राहायचं……

नाहीतर आठवणीत ठेवायलासुद्धा कोणी नसणार ….ही जाणीव पण झाली तर रडत बसण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल हो..

म्हणून जमेल तेवढे नातेवाईक किंवा मित्र गोळा करून ठेवा ….

नाहीतरी ह्या स्मृतीगंधा शिवाय आहे काय आपल्याजवळ.. हो ना …..!

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘रामधान्य…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘रामधान्य…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

आता रामाचे आवडते धान्य कुठले? याचं उत्तर दडलंय एका भांडणात.

चला तर मग बघूया काय आहे हे भांडण.

भगवान श्रीरामांनी रावणाचा पराभव केला आणि ते अयोध्येला जायला निघाले. वाटेत गौतम ऋषींचा आश्रम लागला. त्यामुळे राम, लक्ष्मण आणि  सीतामाई त्यांना भेटायला गेले. गौतम ऋषींनी त्यांचे प्रेमाने स्वागत केले.

राम विजयी होऊन आला होता म्हणून गौतम ऋषींनी खास मेजवानीचे आयोजन केले होते. जेवणात प्रत्येक धान्यापासून बनवलेल्या एकेका पदार्थाचा समावेश होता. जेवताना गौतम ऋषी रामाला प्रत्येक धान्याची माहिती देत होते, त्यांचे गुणदोष सांगत होते. शेवटी ते म्हणाले, “या सर्व धान्यांमध्ये नाचणी सर्वश्रेष्ठ आहे.”

हे ऐकताच तांदळाला राग आला. तो तिथे प्रकट झाला आणि त्याने नाचणीला हिणवायला सुरुवात केली, “म्हणे नाचणी सर्वश्रेष्ठ आहे! आहे काय त्या नाचणीत ? ना रंग ना रूप. छोटे छोटे दाणे आणि काळासावळा रंग. कशी वेडीबिद्री दिसते! मी हंसासारखा पांढराशुभ्र आहे. मला तर फुलासारखा सुगंध येतो. आणि म्हणून लग्नात, इतर मंगलकार्यात अक्षता म्हणून मिरवण्याचा मान माझाच. म्हणून मीच धान्यांत श्रेष्ठ.”

हे ऐकून नाचणीचाही संयम सुटला. तिनेही आपली बाजू लावून धरली. “मी नसेन दिसण्यात सुंदर. पण गरीब असो किंवा श्रीमंत मी भेदभाव न करता सगळ्यांचे पोट भरते.”

शब्दाने शब्द वाढत गेला. शेवटी या दोघांत श्रेष्ठ कोण हे ठरवण्याची जबाबदारी रामावर येऊन पडली. राम म्हणाले, “मी गेली १४ वर्षं घरापासून लांब आहे. मला घरी जायची ओढ लागली आहे. तेव्हा मी आधी अयोध्येला जातो. तिथे जाऊन मी ६ महिन्यांनी परत येईन  आणि मग माझा निर्णय देईन. पण तोपर्यंत तांदूळ आणि नाचणी दोघांना ६ महिने तुरुंगात डांबून ठेवण्यात यावे.”

राम अयोध्येला निघून गेले आणि इकडे तांदूळ व नाचणीची रवानगी तुरुंगात झाली . सहा महिन्यांनी जेव्हा राम परत आले,तेव्हा या दोघांना तुरुंगातून बाहेर काढलं. तांदूळ खराब झालेला होता.त्याला कीड लागलेली होती . नाचणी मात्र जशी गेली तशीच बाहेर आली .

हे बघून प्रभुराम म्हणाले, “तांदूळ आणि नाचणी दोघांवरही सारखीच आपत्ती कोसळली. पण तांदूळ खराब झाला आणि नाचणी तशीच राहिली.” म्हणून त्यांनी आपले मत नाचणीच्या पारड्यात टाकले .

या प्रसंगानंतर राघवाचा जिच्यावर अनुराग (प्रेम) आहे, ती रागी असं नवीन नाव नाचणीला मिळालं.

मित्रांनो, तांदूळ आणि नाचणीच्या भांडणाची ही गोष्ट कानडी संत कनकदास यांच्या ‘रामधान्यचरित्र’ या काव्यात सांगितलेली आहे.

माणसाचे चारित्र्य त्याच्या जन्मावरून, रंगरूपावरुन न ठरवता त्याचे विचार कसे आहेत आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कठीण प्रसंगात तो कसा वागतो यांच्यावरून त्याची पारख केली पाहिजे.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares