मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ हो.. आम्ही मध्यमवर्गीय होतो..!! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

हो.. आम्ही मध्यमवर्गीय होतो..!! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित

साधारण 20-25 वर्षांपूर्वी  “मध्यमवर्गीय” ही जमात अस्तित्त्वात होती. तसं तर संपूर्ण भारतभर ती पसरली होती, पण महाराष्ट्रात तिचा स्वतः चा असा ‘ब्रँड’ होता.

घरात एक कमावता पुरुष,दोन तीन भावंडं, नवराबायको, कुठे कुठे आजी आजोबा, क्वचित प्रसंगी भाचा-पुतण्या शिकायला अशी एकूण कुटुंबसंस्था होती. एक कमावता आणि खाणारी तोंड 5-6  हे चित्र सगळीकडे सारखंच होतं. काही ठिकाणी महिलावर्ग नोकरीसाठी बाहेर पडला होता, पण आजच्याइतका नाही.  म्हणूनच की काय घर, किचन ह्यावर स्त्रीवर्गाची सत्ता होती…..एकहाती सत्ता !! पण तिथलं तिचं स्वतःचं एक गणित होतं…पक्कं गणित..!!त्या वरच सगळे हिशोब जुळत होते.

अन्नाच्या बाबतीत,”पोटाला खा हवं तेवढं , पण नासधूस नको” असा शिरस्ता होता. माझी आजी नेहमी म्हणायची,”खाऊन माजावं, पण टाकून माजू नये.”

कढी, डाळभाजी करायची त्या दिवशी वरण कमी लावायचं, आंब्याचा रस असेल तर भाजी कमी करायची, रवी लावली की त्या ताकाची कढी करायची, त्याच तुपाच्या भांड्यात दुसऱ्या दिवशी पोळ्या टाकायच्या… अशी साधी साधी समीकरण असायची. घरातली पुरूषमाणसांची आणि मुलांची जेवणं आधी करून घेतली की बायका मागून जेवायच्या. उरलंसुरलं त्या खावून घ्यायच्या. त्यांच्या पंगतीला पुरवठा म्हणून खमंग थालीपीठ किंवा गरमागरम पिठलं असायचं. इतकंही करून पोळी – भात उरलाच तर दुसऱ्या दिवशी त्याचा व्हायचा ‘कुचकरा’ किंवा ‘फोडणीचा भात’.  जगातले सगळ्यात चविष्ट पदार्थ आहेत हे. सकाळच्या नाश्त्याचा प्रश्न परस्पर मिटायचा.

मुलांची शाळा म्हणजे ‘टेन्शन’चा विषय नव्हता. आपली साधी मराठी शाळा. 200-300 रू वर्षाची फी. पण युनिफॉर्म, पुस्तके आपले आपल्याला घ्यावे लागायचे. जरा मोठाधाटा युनिफॉर्म घेतला की सहज 2 वर्ष जायचा. 

पुस्तकांचा जरा ‘जुगाड’ असायचा. म्हणजे समजा ‘अ’ ने दुकानातून कोरीकरकरीत पुस्तकं विकत घेतली असतील, तर तो ती पुस्तकं वर्ष संपल्यावर ‘ब’ ला 70% किमतीत विकायचा.. अन् मग ‘ब’ तीच पुस्तकं  ‘क’ ला 40% मधे विकायचा.

Purchase Cost, Selling Cost, depreciated Value हे कामापुरतं “अर्थशास्र”  सगळ्यांनाच येत होतं. एकदा विकत घेतलेली पुस्तकं तीन वर्षं सर्रास वापरली जायची. 

पुस्तकाच्या या 3 वर्षाच्या प्रवासात कधी कधी बेगम हजरत महल,अहिल्याबाई अशा “दूरदृष्टी च्या” व्यक्तिमत्त्वाला चष्मा लागायचा, कोणाला दागिने मिळायचे, तर कोणाला दाढी मिशी यायची. आणि हे असे उद्योग अ ब क पैकी कोणी तरी नक्कीच करत होतं.

बंगालच्या उपसागरात हमखास दोन तीन जहाज फिरत असायची. पण शाळेत असतांना, ते मॉरिशस, अंदमान निकोबार, केरला बॅकवाॅटर अशी Destinations मला नकाशात सुद्धा कधी भेटली नाहीत.

पुस्तकातल्या रिकाम्या जागा भरा,जोड्या जुळवा अशी बिनडोक कामे सहसा ‘अ’ करून मोकळा व्हायचा… म्हणूनच की काय त्यानंतर ब आणि क ह्यांना फक्त  चित्रकलेतच “स्कोप” उरलेला असायचा. आणि त्याचा प्रत्यय पुस्तकाच्या पानापानावर यायचा…

शाळेचा युनिफॉर्म असल्यामुळे खूप कपडे लागत नसत.मोठ्या भावा बहिणींचे कपडे घालणं,त्यांचे दप्तर- स्वेटर वापरणं ह्यात ‘ इगो बिगो’ कोणाचा आड येत नव्हता..

स्वेटरचा तर मोठा प्रवास असायचा.. त्यातही लहान बाळाचं स्वेटर,कपडे,दुपटे,झबले इतके फिरायचे की त्याचा मूळ मालक कोण हेही कोणाला अाठवायचं नाही..

पण आमच्या आधीच्या पिढीने शिक्षणाचे महत्त्व जाणले होते. त्यामुळे अभ्यास सगळ्यांना करावाच लागायचा. मुलींना “यंदा नापास झालीस किंवा कमी मार्क्स मिळाले तर तुझं लग्न लावून देवू..” आणि मुलांना, “तुला रिक्षा  घेवून देवू चालवायला” अशी  “जागतिक” धमकी मिळायची..

12 वी नंतर कुठल्या शाखेकडे जायचं, कोणता कोर्स करायचा, घरातल्या मोठ्या दुरुस्त्या, उपवर-उपवधू ह्यांना आलेली स्थळं ….Proposals.. हे आजच्या काळातले  “Highly Personal Issues”  त्या काळात बिनदिक्कतपणे गोलमेज परिषद भरवून चर्चिले जात. हातपाय पसरायला लागते, तेवढीच काय ती प्रत्येकाला घरात  Space.. …बाकी सगळा ‘लेकुरवाळा’ कारभार!!

आठवडी बाजारातून भाज्या आणणे, किराणा आणणे, लांबच्या लग्नाला हजेरी लावणे हा ‘बाबा’ लोकांचा प्रांत होता.प्रत्येक बाबांच्या तीनचार तरी  RD , LIC काढलेल्याच असायच्या…..आणि  त्यासुद्धा बहुतेक वेळा एजंटवरील प्रेमापोटी !!! बाकी शेअर्स, Mutual Fund वगैरेचा ‘एजंट’ त्या काळी उदयाला आलेला नव्हता.आणि कोणी काही वेगळ्या स्कीम आणल्याच, तर अगदी पाचच मिनिटात त्याच्या उत्साहाला अन् पर्यायानं त्याच्या कमीशनला सुरुंग लागायचा… Share market म्हणजे जुगार.. हा ‘समज’ अगदी पक्का होता..

‘फॅमिली डॉक्टर’ हा एक जिव्हाळ्याचा विषय होता. प्रत्येक कुटुंबाचा वेगळा डॉक्टर असायचा. आजीच्या दम्यापासून ते बाळाच्या तापापर्यंत सगळ्या व्याधीवर त्याच्याकडे औषध असायचे. तसे ते डॉक्टर पण ‘नीतिमत्ता’ वगैरे बाळगून होते. उगाचच आजच्या सारखं भारंभार टेस्ट अन् सोनोग्राफी करायला सांगायचे नाहीत.. गरज असेल तरच करूया,  पेशंटला परवडेल आणि ह्यांचा दवाखाना पण चालेल, असा त्यांचा ‘व्यावहारिक’ पवित्रा असायचा.

जसा ‘फॅमिली डॉक्टर’ तशीच एक फॅमिली ‘बोहारीण’ पण असायची. पण ती फक्त आईची मैत्रीण.. बाकी कोणी तिच्या वाट्याला जात नसत.. आई सगळे जुने कपडे एका गाठोड्यात बांधून ठेवे. मग ही  ‘बोहारिण’ एका दुपारी अवतरायची.. आधीच दुपारच्या झोपेचं खोबरं झाल्याने, आई  जरा वैतागलेली असायची.. भलं मोठं कपड्यांचं गाठोडं विरुद्ध चहाची गाळणी अशी ‘तहा’ ला सुरवात व्हायची..तिची गाळणी खपवायची घाई….तर आईचा मोठ्या पातेल्यावर डोळा!!! खूप घासाघीस करून  ‘Deal’ चहाच्या पातेल्यावर फिक्स व्हायची.. ह्या  कार्यक्रमात 2-3 तास आरामात जायचे, शेजारच्या सगळ्या आत्या, मावशी, काकू ह्या वाटाघाटीत सक्रिय सहभाग घ्यायच्या.शेवटी त्या नवीन चहाच्या पातेल्यात चहा व्हायचा आणि मगच सगळं महिला मंडळ परागंदा व्हायचं..

खरं सांगू का.. …मध्यमवर्गीय ही काही ‘परिस्थिती’ नाहीये, ती  “वृत्ती” आहे……साध्या, सरळ, कुटुंबवत्सल, पापभीरू माणसांची. मध्यमवर्गीयच आहेत ह्या समाजाचा ‘कणा’.. ते आहेत म्हणून तर ह्या समाजात चांगल्या वाईटाची चाड आहे.. आम्हीच आहोत नियमित ‘कर’ भरणारे, वाहतुकीचे काटेकोर ‘नियम’ पाळणारे आणि प्रत्येक निवडणुकीत ‘मतदान’ करणारे.

असे आम्ही सगळेच मजेत होतो बघा..अचानक 1990-91 मध्ये जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले.. ते आमच्यापर्यंत यायला 10-12 वर्षे गेली पण तोपर्यंत त्या वाऱ्याचं  ‘ वादळ ‘ झालं होत.. अन् मग त्या वादळात उडून गेलं आमचं मध्यमवर्गीयपण..

प्रेमळ, मिळून-मिसळून राहणारे, सामाजिक बांधिलकी जपणारे आम्ही……अचानक ‘प्रोफेशनल’ झालो. माणसामाणसातलं आपलेपण कोरडं झालं. कालांतराने ते भेगाळलं.

पुढे पुढे त्या भेगांच्याच भिंती झाल्या.Busy Schedule, Deadlines, Projects Go Live अश्या ‘गोंडस’ नावाखाली आम्ही ते स्वीकारलं. गलेलठ्ठ  Packages  मधे गुंडाळल्या गेला आमच्यातला चांगुलपणा, प्रेमळपणा आणि आपलेपणा सुद्धा…

कवी :अज्ञात

प्रस्तुती : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ AMOR FATI – आमोर फाटी : नशिबावरचा विश्वास – संकलन : प्रा. माधव सावळे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ AMOR FATI – आमोर फाटी : नशिबावरचा विश्वास – संकलन : प्रा. माधव सावळे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

हा शब्द लॅटिन भाषेतला आहे. याचा उच्चार कसा करतात मला माहित नाही. मी आमोर फाटी असा करतोय… याचा अर्थ आहे नशिबावरचा विश्वास“.

आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट मग ती वाईट असली, नुकसान करणारी असली तरीही ती तशी घडणे आवश्यक होते… अशा दृष्टिकोनातून ती गोष्ट स्विकारणे. ती गोष्ट आवडली नाही तरीही ती स्विकारणे… अगदी झेन तत्वज्ञानात सांगितलेल्या शांततेने, प्रसन्नतेने स्विकारणे. 

थाॅमस एडिसन जेवत होता. तेवढ्यात एक माणूस धावत आला.  त्याने वाईट बातमी आणली होती. एडिसनच्या प्रयोगशाळेला आग लागली होती. 

एडिसनने त्याला कसा प्रतिसाद दिला असेल असे वाटते?

“अरे देवा, काय हे… माझं नशिबच फुटकं… माझी सगळी मेहनत वाया गेली… ” ..  अशी?

की त्याने खूप चिडून, बिथरून, आरडाओरड केली असेल?

… पण यापैकी काहीच घडलं नाही. एडिसनने आपल्या मुलाला हाक मारली आणि म्हणाला, “अरे तुझ्या आईला आधी बोलाव, तिला अशी आग परत पहायला मिळणार नाही.”

स्वाभाविकपणे मुलाला हेच वाटले की आपल्या बापाचे डोके फिरले, वेडा झाला बाबा. आजवर केलेली सर्व मेहनत आगीत भस्मसात होत होती आणि एडिसन शांत होता. तो शांतपणे म्हणाला, “आग लागली हे बरं  झालं. माझ्या सगळ्या चुका आणि इतर अनावश्यक गोष्टी जळून गेल्या.”

आमोर फाटी खऱ्या स्वरुपात स्विकारणे म्हणजे काय, याचे हे उदाहरण म्हणता येईल – नशिबात असलेली गोष्ट आनंदाने स्विकारणे. ६७ वर्षांचा एडिसन विमनस्क, हताश, उदास काहीच न होता नव्या उत्साहाने कामाला लागला. आगीत भस्मसात झालेली संपत्ती त्याने दसपटीने परत मिळवली.

मी या आमोर फाटी कल्पनेच्या प्रेमातच पडलोय. का माहितेय? कारण आपलं नशिब स्विकारण्यातली ताकत मला समजलीय. यात अक्षरशः एवढी प्रचंड ताकत आहे की आपल्याला काहीच अशक्य वाटत नाही.  प्रत्येक गोष्ट होण्यामागे काही कारण असतं आणि ती गोष्ट सकारात्मकतेने स्विकारणे हे तुमच्या हातात असते.

# कदाचित तुमचा जाॅब गेला असेल,

# कदाचित तुमची आयुष्यभराची कमाई कोणी लुबाडली असेल,

# कदाचित तुमच्या सर्वात प्रिय व्यक्तीला असाध्य रोग झाला असेल,

# कदाचित तुम्हाला कोणी अत्यंत वाईट वागणुक दिली असेल,

# कदाचित आयुष्याने तुमच्यासमोर असे आव्हान उभे केले असेल ज्यातून तुमची सुटका नाही,

तुम्ही हे सगळं हसत स्विकारता आणि त्यातूनच नव्या उर्जेने पुढे जाता – – “ याला आमोर फाटी म्हणतात.” 

संकलन : प्रा. माधव सावळे

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ ज्ञानदेवांचा अद्वैतानुभव… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

? वाचताना वेचलेले ?

 ☆ ज्ञानदेवांचा अद्वैतानुभव… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

“पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती “ —  हा अभंग सर्वाना परिचित आहे. हा ज्ञानेश्वर माऊलीनी लिहिलेला अभंग आहे. या अभंगात आलेले दोन शब्द नेहमी  वेगळे वाटायचे, एक कानडा आणि दुसरा करनाटकु पण वाटायचे कानडा म्हणजे कानडी आणि करनाटकु म्हणजे कर्नाटक राज्यात. पण मग ज्ञानेश्वर महाराज का करतील असा उल्लेख? तेव्हा हे राज्य थोडी असेल. पण या शंकेचे निरसन झाले,  ४/५ वर्षांपूर्वी मला श्री. हृदयनाथ मंगेशकर यांना ऐकण्याचा योग आला, पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या कार्यक्रमात. तेव्हा त्यानी या शब्दांचा अर्थ असा सांगितला, ‘ कानडा म्हणजे अगम्य, समजायला अवघड, न कळणारा असा आणि  करनाटकु म्हणजे नाटकी, करणी करणारा असा.’  हे अर्थ समजल्यावर गाण्याची गोडी अजूनच वाढते. आज मी मला समजलेला अर्थ उलगडून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तो वाचल्यावर पुन्हा एकदा  गाणं ऐकत गाण्याच्या रसास्वाद घ्या. मनाला खूपच आनंद मिळेल. 

पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती। रत्नकिळ फाकती प्रभा। 

अगणित लावण्य तेज पुंजाळले। न वर्णवे तेथिची शोभा॥१॥

ज्ञानदेवांच्या दृष्टीपुढे सावळा पांडुरंग उभा आहे. विविध रत्नांची प्रभा फाकावी तशी पांडुरंगाची कांती दिव्य तेजाने झळकत आहे. ज्ञानदेवांचे अंतःकरण आत्मप्रकाशाने उजळून गेले आहे. विटेवर उभा असलेल्या पांडुरंगाच्या तेजःपुंज लावण्याची शोभा काय वर्णावी? त्यासाठी शब्द अपुरे पडतात. विठूचे हे तेजःपुंज सौंदर्य अगणित व असीम आहे.

कानडा वो विठ्ठलु करनाटकु। येणे मज लावियेला वेधु। 

खोळ बुंथी घेउनी खुणाची पालवी। आळविल्या नेदी सादु॥२॥ 

प्रकाशाचे अंग हे प्रकाशाचेच असते याप्रमाणे हा विठ्ठल कसा आहे? तर तेजःपुंज असा हा विठ्ठल, कानडा म्हणजे अगम्य, न कळणारा असा आहे. तो नाटकी (कर नाटकु)  आहे. अवघ्या विश्वामधे विविध रुपात (पशु, पक्षी,  माणूस सारे स्थिरचर) वावरणारा हा भगवंत नाटकी नाही तर काय आहे? सगळ्यांच्या भुमिका हाच तर करत असतो. त्याच्या या नाट्यावर तर मी भुलले आहे. माझे मन मोहून गेले आहे. त्याच्या या नाटकाचा मला वेध लागला आहे. त्याच्या नाटकाला अंत नाही की पार नाही. खोळ म्हणजे पांघरुण किंवा आवरण. प्रत्येक प्राणीमात्रांत तो आहे. विविध रुपाची कातडी पांघरुन (खोळ बुंधी घेवूनी), जणू काही तो माझ्याकडे पहा, मला ओळखा, मला ओळख असे सांगत आहे. एखाद्या लबाड मुलासारखा मला खुणावत आहे. पण हाक मारल्यावर मात्र ओ पण देत नाही ( आळविल्या नेदी सादु ). असा हा नाटकी पांडुरंग, आणि त्याच्या नाटकाबद्दल काय सांगू? विविध रुपाची खोळ घालून येत असल्याने त्याला ओळखताही येत नाही. असा हा कानडा म्हणजे कळायला मोठा कठीण आहे. 

शब्दविण संवादु दुजेवीण अनुवादु। हे तव कैसेंनि गमे। 

परेही परते बोलणे खुंटले। वैखरी कैसेंनि सांगे॥३॥  

प्रेमाच्या अभिव्यक्तीला शब्द कशाला हवेत. आईला, ‘बाळा माझे तुझ्यावर फार प्रेम आहे ‘, हे सांगावे लागते का? न बोलता तिच्या दृष्टीत ते ओथंबून वहात असते. तसेच आपल्या देवाशी बोलायला आपल्याला शब्द कशाला हवेत?  परा, पश्यंति, मध्यमा आणि वैखरी असे वाणीचे चार प्रकार आहेत. वैखरी म्हणजे शब्दात बोलतो ती, विचार करताना आपण आपल्याशी बोलतो ती भाषा म्हणजे  मध्यमा, पश्यंती म्हणजे ह्रुदयाची भाषा आणि आत्म्याशी संवाद करणारी वाणी म्हणजे परा वाणी. विठ्ठलाशी बोलताना परा वाणी सुद्धा मुक होते. बोलणे  खुंटते. शब्दावाचून संवाद होतो. जसे आईला तान्हुल्याला भूक लागली हे सांगावे लागत नाही,  शब्दावाचून कळते तसे परमात्म्याला भक्ताचे बोलणे. न बोलता कळते. एक बोलला तर दुसरा उत्तर देईल ना? दुजेपणाशिवाय बोलणे कसे होते हे परा वाणीला जेथे सांगता येत नाही तिथे वैखरीला (जीभेला) कसे बरे सांगता येईल?

पाया पडु गेले तव पाउलचि न दिसे। उभाचि स्वयंभु असे। 

समोर की पाठीमोरा न कळे। ठकचि पडिले कैसे ॥४॥ 

या विठ्ठलाचा नाटकीपणा किती सांगू? पायावर डोके ठेवायला गेले तर पाउलची न दिसे. समोर पहावे तर उभा आहे.  पण माझ्या समोर उभा  आहे की पाठमोरा उभा आहे हेच कळत नाही. माझ्या पुढे आहे की माझ्या मागे उभा आहे, खालून पाहतोय की वरून  हेच समजत नाही. अशाप्रकारे हा मला सारखा फसवत (ठकचि) आहे,  ठकवत आहे. आपल्या अवतीभवती सर्वत्र तोच व्यापून आहे एवढे खरे.

क्षेमालागी जीव उतावीळ माझा। म्हणवूनि स्फूरताती बाहो।

क्षेम देऊ गेले तव मीचि मी एकली।आसावला जीव रावो ॥५॥ 

त्याला आलिंगन देण्यासाठी माझा जीव उतावीळ झाला आहे. त्यासाठी माझे बाहु स्फुरण पावताहेत. मला वाटते एवढासा हा विठ्ठल  त्याला मिठी मारणे किती सोपे. त्याला मिठी घ्यायला गेले तर मीच एकटी उरले. हा नाटकी कुठे गेला कळलेच नाही. त्याला आलिंगन देण्याची इच्छा माझी अपुरी राहिली.

बाप रखुमादेवीवरु हृदयीचा जाणुनी। अनुभवु सौरसु केला। 

दृष्टीचा डोळा पाहों गेले। तव भीतरी पालटु झाला ॥६॥ 

हा विठ्ठल बाहेर नसून ह्रुदयात वसतो असे कळले म्हणून  त्याचा अनुभव घेण्यासाठी मी माझी दृष्टी आत वळवली तर काय माझे अंतरंगच बदलून गेले. आत तोच, बाहेर तोच, समोर तोच, मागे तोच, देह तोच आत्मा तोच. जिकडे पहावे तिकडे तोच. विश्वात तोच, विश्वापलीकडे तोच नाना मुखवटे घेवून त्याचे नाटक सुरूच आहे. वरवर पहायला जावे तर कसा कमरेवर हात ठेवून विटेवर निश्चल उभा आहे. जणू काही भोळा सांब. पण तुझ्यासारखा नाटकी दुसरा कोणी नाही. विश्वाची खोळ अंगावर घेऊन दडून काय बसतोस? माझ्यासारखीला दुरून काय खुणावतोस, हाक मारल्यावर गप्प काय बसतोस, पाया पडायला आलें तर पाऊले लपवतोस,  समोर- मागे येऊन काय ठगवतोस, क्षेम(मिठी) द्यायला गेले तर हृदयात काय लपतोस. कळली तुझी सारी नाटके. तू पक्का नाटक (करनाटकु) करणारा आहेस आणि  अनाकलनीय (कानडा) आहेस.   

ज्ञानदेव स्त्री(प्रकृती) भावाने विठ्ठलाशी(पुरुष =परमात्मा) बोलतात. हे बोलणे म्हणजे एका अंगी तक्रार आहे तर दुसरीकडे त्याची स्तुती केली आहे. ज्ञानदेवांचा अद्वैतानुभव, त्यांचा साक्षात्कार या अभंगात काव्यमय रीतीने शब्दबद्ध केला आहे.

राम कृष्ण हरी

याचसाठी गदिमा ‘ वेदांनाही नाही कळला अंतपार याचा ।। कानडा राजा पंढरीचा…।।’  असं म्हणतात.

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जे द्याल, तेच परत येईल, कितीतरी पटीने…!” – लेखक – श्री जयप्रकाश झेंडे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “जे द्याल, तेच परत येईल, कितीतरी पटीने…!” – लेखक – श्री जयप्रकाश झेंडे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

१८९२ मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठात घडलेली घटना ही सत्यघटना आहे. परंतु याची शिकवण मात्र शाश्वत आहे, कायम टिकणारी आहे. एक १८ वर्षांचा मुलगा अत्यंत कष्टानं विद्यापीठातील शिक्षण घेत होता. आपली फी भरणं ही त्याला अवघड जात होतं. हा मुलगा अनाथ होता आणि एकदा फीचे पैसे कोठून आणायचे या विवंचनेत होता. एक अतिशय चमकदार कल्पना त्याच्या डोक्यात आली. त्यानं आणि त्याच्या मित्रानं महाविद्यालयाच्या एका संगीत जलशाचं आयोजन करायचं निश्चित केलं. त्यातूनच आपल्या शिक्षणाची फी गोळा करायचं ठरवलं. त्यांनी एक मोठा पियानोवादक आय. जे. पेडरवस्की यांना भेटायचं ठरवलं. त्यांच्या व्यवस्थापकानं २००० डॉलर एवढ्या रकमेची मागणी संगीत जलशासाठी केली. या दोघा मित्रांचा संगीत जलसा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नही मोठा धडाक्यानं सुरू झाले.

जलशाचा दिवस उजाडला. पेडरवस्की यांनी कबूल केल्याप्रमाणे हा कार्यक्रम पारही पडला. परंतु दुर्दैवानं तिकीट विक्रीतून फक्त १६०० डॉलरच जमा होऊ शकले. अतिशय जड अंत:करणानं दोघेही मित्र पेडरवस्की यांच्या घरी पोहोचले. त्यांनी पेडरवस्कींना सर्व परिस्थिती समजावून सांगितली. त्यांना जमा झालेली संपूर्ण रक्कम म्हणजे १६०० डॉलर्स आणि उरलेल्या ४०० डॉलर्सचा चेक दिला. लवकरच आम्ही या ४०० डॉलर्सची रक्कम देऊ हे वचनही दिलं.

नाही, असं चालणार नाही, मला हे अमान्य आहे असं पेडरवस्की म्हणाले आणि त्यांनी तो ४०० डॉलर्सचा चेक फाडून टाकला आणि मुलांना १६०० डॉलर्सची रक्कम परत केली. त्या मुलांना सांगितलं, हे १६०० डॉलर्स घ्या. यातून तुमचा झालेला खर्च वजा करा. त्यानंतर आपल्याला भरावयाच्या फीची रक्कमही त्यातून काढून घ्या आणि त्यातून जी रक्कम उरेल तीच रक्कम मला द्या. मुलांना या वागण्याचं खूपच आश्चर्य वाटलं आणि या औदार्याबद्दल पेडरवस्कींचे मनापासून आभार मानून मुलं परतली.

ही चांगुलपणाची एक छोटीशीच कृती होती, परंतु त्यावरूनच श्री. पेडरवस्की यांच्या मोठेपणाची एक चुणूक दिसून येते, त्यांच्यातली माणुसकी प्रतीत होते. त्यांना माहीतही नसणाऱ्या परक्या दोन विद्यार्थ्यांना त्यांनी मदत का करावी? 

आपणा सर्वांच्यात आयुष्यात हे प्रसंग येतात आणि अशा वेळी आपण मात्र विचार करतो अशीच मदत मी सर्वांना करत राहिलो तर माझं काय होईल? परंतु खऱ्या अर्थी मोठी असणारी माणसं मात्र विचार करतात की मी त्यांना मदत केली नाही तर त्यांचं काय होईल? आपल्याला त्यांच्याकडून परत काय मिळेल, याचा विचारही अशा मोठ्या माणसांच्या मनाला स्पर्श करीत नाही.

पुढे काही वर्षांनी श्री. पेडरवस्की पोलंडचे पंतप्रधान झाले. ते अतिशय उत्तम नेते होते, परंतु दुर्दैवानं जागतिक युद्ध सुरू झालं. त्यात पोलंड उद्ध्वस्त झालं. देशात जवळ १५० लाख माणसं अन्नधान्यावाचून भुकेली होती. त्यांची भूक भागविण्यासाठी पोलंडकडे पैसाही नव्हता. कोठून आणि कशी मदत मिळवावी, या विचारानं पेडरवस्की अस्वस्थ झाले होते. त्यांनी अमेरिकेतील अन्नधान्य आणि साहाय्य या सरकारी प्रशासनाकडे मदत मागितली. त्या विभागाचे प्रमुख हर्बर्ट हुव्हर हे होते. तेच पुढे अमेरिकेचेही अध्यक्ष झाले. हुव्हर यांनी मदत देण्याचं कबूल केलं आणि त्यांनी ताबडतोब पोलंडमधील भुकेल्या लोकांसाठी हजारो टन अन्नधान्य पाठवूनही दिलं. पोलंडमधील लोकांवरचा कठीण प्रसंग टळला, संकट दूर झालं. पेडरवस्कींची मोठी चिंता दूर झाली. त्यांनी स्वत: अमेरिकेला जाऊन हुव्हर यांचं आभार मानायचं ठरवलं. 

जेव्हा पेडरवस्की त्यांना भेटले आणि त्यांचे आभार मानू लागले तेव्हा त्यांचे बोलणं मध्येच तोडून पटकन हुव्हर म्हणाले, पंतप्रधान महोदय, आपण माझे आभार मानण्याची काहीच गरज नाही, आणि ते योग्यही होणार नाही. आपल्याला कदाचित स्मरणार नाही, परंतु अनेक वर्षांपूर्वी आपण दोन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली होती आणि मी त्यातील एक विद्यार्थी आहे.

हे विश्व म्हणजे अतिशय सुंदर आहे. आपण या जगासाठी जे देतो तेच अनंत पटीनं आपल्याकडेच परत येत असतं. अनेक वेळेस ते आपल्याला कळतही नाही.

लेखक : श्री जयप्रकाश झेंडे

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ थोडा अंधार हवा आहे … – लेखक : योगिया ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ थोडा अंधार हवा आहे … – लेखक : योगिया ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

हल्ली सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठला असेल तर तो म्हणजे कधी अंधारच होत नाही. सगळीकडे इन्व्हर्टर असतात आणि अगदीच नसले तरी लोकं दुसऱ्या सेकंदाला मोबाईलचा लाईट लावतात आणि अंधार घालवतात. त्यामुळे दुसऱ्या क्षणी तुम्हाला तुमच्या पुढचं, आजूबाजूचं दिसू लागत. पण तिथेच खरा प्रॉब्लेम आहे.

मला आठवतं आहे, आमच्या लहानपणी इन्व्हर्टर, मोबाईल नव्हते. मेणबत्त्या, कंदील हे ऑप्शन होते. पण कधी रात्री लाईट गेले तर दुसऱ्या सेकंदाला आजीचा आवाज यायचा. “कोणीही जागचे हलू नका. आहे त्या जागेवर बसून आपापले डोळे २ मिनिटे घट्ट बंद करा आणि आम्ही डोळे घट्ट मिटायचो. मग २ मिनिटांनी आजीचा आवाज यायचा.. आता हळूहळू  डोळे उघडा आणि आपोआप अंधारात दिसू लागेल. आणि खरंच मगास पेक्षा आता थोडं दिसू लागलं असायचं. मला अजूनही याचं अप्रूप आहे. मुळात अंधारात असताना डोळे का मिटायचे, त्याने काय होणार पण डोळे मिटून उघडले की दिसू लागायचं हे खरं. मला वाटतं की जुन्या पिढीला हीच सवय होती कि अंधारात असलो की अजून घट्ट डोळे मिटून आत डोकावायचे. स्वतःचे डोह धुंडाळायचे. आपल्या जाणिवा, नेणिवाचे झरे मोकळे करायचे आणि मग वाटा स्पष्ट होतं असाव्यात / दिसत असाव्यात. आणि आपणच शोधलेली आपली वाट असेल तर मग ती सुकर होते, त्याचं ओझं होत नाही आणि त्या वाटेवरचा प्रवास समाधान देणारा असतो.

माझ्या आजोबांचा पण लाईट गेले की एक आवडता डायलॉग होता. “अंधारात रस्ता दिसतो आणि उजेडात फक्त खड्डे दिसतात.. दिवे येई पर्यंत तुमचे रस्ते शोधा”.. लहानपणी मला हा विनोद वाटायचा पण हल्ली आजोबा आठवतात, त्यांचं वाक्य आठवतं आणि आता कुठे त्याचा अर्थ ५० वर्षांनी थोडाफार कळतो. स्वतःच्या तरुणपणी परिसस्थितीच्या अंधारात त्यांनी कष्ट सोसले, वार लावून जेवले, शिकले, नोकरी केली, आपला रस्ता शोधला. स्वतःच्या पोटाला चिमटा काढून मुलांना इंजिनिअर केलं, त्याची फळं आम्ही उपभोगतोय. कधी नव्हे तर परवा खूप वेळ लाईट गेले, इन्व्हर्टर बंद पडला तर किती चिडचिड. डेटाचा स्पीड थोडा कमी झाला आणि लॅग आला तर त्रागा. पिझ्झा अर्ध्यातासात डिलिव्हर नाही झाला तर फ्री ची मागणी. उजेडात फक्त  खड्डे दिसतात हेच खरं.

पण हल्ली अंधारच होत नाही. मुळात अंधारच माहित नाही. आजूबाजूला सारखा लाईट असतो पण तो एनलायटन करू शकत नाही आणि डोळेच कघी न मिटल्यामुळे आत डोकावायची वेळच येत नाही. इन्व्हर्टर / मोबाईल च्या लाईट ने आजूबाजूचं दिसतं आणि फक्त आजूबाजूचं दिसलं तर फक्त स्पर्धा वाढते, पण वाट काही सापडत नाही. वाट सापडायची असेल तर आत डोकावता आलं पाहिजे. आपापले डोह धुंडाळता आले पाहिजेत. अंधारात तळाशी पोहोचणं सोपं होतं असावं. म्हणून अधून मधून थोडा मिट्ट अंधार हवा आहे.

लेखक : योगिया 

संग्रहिका : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ कुटुंबातील मॅनर्स… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

? वाचताना वेचलेले ?

 ☆ कुटुंबातील मॅनर्स… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

सुई दोरा वापरण्याचा एक नियम पुर्वी पाळला जायचा, अजूनही अनेक घरात असेल. नियम असा असतो की, समजा एखाद्याने दोऱ्याने काही शिवलं आणि ओवलेला दोरा संपला तर त्याने परत सुईत दोरा ओवून गाठ मारुन तो नीट रिळाला गुंडाळून ठेवायचा. दुसऱ्याला सुईला दोरा लावलेला मिळतो, त्याचं काम झालं की त्यानं परत तेच करायचं.

पुर्वीच्या काळी पाण्याचे बंब असायचे. एकत्र कुटुंब असायचं. गरम पाण्याच्या बाबतीतही हा नियम असायचा की जो बंबातून पाणी घेईल त्यानं आंघोळीला जाण्यापुर्वी दुसऱ्यासाठी बंबात पाणी भरायचं. दुसऱ्यानं तिसऱ्यासाठी, जेणेकरुन वेळ आणि इंधन बचत व्हायचीच पण गैरसोयही टाळता यायची.

सुबत्ता वाढत गेली तसतशी एकमेकांवर अवलंबून जगण्याची जीवनशैलीही बदलत गेली. आता दुसऱ्याचा विचार करण्याची वेळ वारंवार येत नाही, पण याचा अर्थ तो करायचाच नाही असं मात्र नाही.

आपला पेपर वाचून झाला की त्याच क्रमानं नीट पुरवणी आत ठेऊन निश्चित जागी ठेवला तर दुसऱ्याला ताजा पेपर वाचल्याचा फील येतो नि शोधाशोध पण करावी लागत नाही.

पाण्याची बाटली आपण रिकामी केली तर लगेच भरुन फ्रीज मधे ठेवली तर ही साखळी चालू राहून एकालाच हे काम करावं लागत नाही.

बेसिनपाशी हँडवाॅश संपत असतं. ज्याला कळेल त्यानं रिफिल करायचं हा नियम केला तर कोणालाही त्रास होणार नाही.

पाण्याचा ग्लास, चहाचे कप आपापले धुवून, घासून ठेवायचे हा नियम घरात पाळला तर भांडी कमी साठतील.

खाऊ, फळं, नियमित खाल्ले जाणारे पदार्थ किंवा  कात्री, स्टेपलर, सेलोटेप सारख्या वस्तू एकाच जागी ठेवणे. आपली टर्न आल्यावर संपल्या नि बिघडल्या तर आठवणीने आणणे, ही काळजी घेणे.

घर सगळयांचं असतं. सगळी जबाबदारी गृहिणीची असं म्हणून जबाबदारी झटकून न टाकता एकत्र रहाण्याचे मॅनर्स सगळयांनीच शिकायची गरज आहे. प्रेमात आणि नात्यात एकमेकांसाठी कामं केली जातात पण त्यामुळेच एकत्र जगण्याच्या शिस्तीला तडा जातो नि चुकीच्या सवयी लागतात.

घर ही एक संस्था समजून घराची एक शैली एक नियमावली जरुर तयार करा. हे एक लहानसं युनिट समजा. देशात अराजकता माजू नये म्हणून कायदे असतात तसे घरातही काही नियम असले पाहिजेत तरच त्याचं हाॅटेल होणार नाही (खरंतर हाॅटेलचे सुध्दा नियम असतातच).

ही एक संधी आहे. घराला घरपण देण्याची. सगळे घरात आहेत, काही एकत्र सवयी लावून घेतल्या तर भविष्यात नक्कीच फायदा होईल.

आपल्या घरामध्ये कोणाचाही फोन आला तर एकमेकांना त्यांचे निरोप न विसरता देणे घरातील कोणाकडेही मित्र मैत्रीण आल्यास त्यांचे यथोचित स्वागत करणे.घरी येणारी व्यक्ती ही कुटुंबाची मैत्री आहे समजून त्यांचे आदरातिथ्य करूया. घरातील प्रत्येक वस्तूवर व्यक्तींची नावे असलीच पाहिजेत असे नाही. बहुतेक सर्व वस्तू कॉमन असतात. त्याला ही घर पण म्हणतात.तसेच घरातील कोणतीही खाण्यापिण्याची वस्तू संपविण्यापूर्वी कोणी खायचे राहिले नाही ना ? अशी चौकशी करावी. घरातील प्रत्येकाचे दिवसभराचे काम, अंदाजे वेळापत्रक,उद्योगातील आर्थिक व्यवहार एकमेकांना माहिती असण्याची आवश्यकता आहे.

कुटुंबातील माहेरची किंवा सासरची व्यक्ती असो सर्वांचे समान आदरातिथ्य असावे अशा प्रकारच्या गोष्टींना कुटुंबातील मॅनर्स किंवा संस्कार असे म्हणतात, याचे खूप चांगले परिणाम पुढील पिढीवर होतात.

संस्कार संस्कार म्हणजे आणखी वेगळं काही नसतं.

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ “इतिहासातील ‘हिट अँड रन‘ प्रकरण…” – लेखिका : डॉ. सुनीता दोशी ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ “इतिहासातील ‘हिट अँड रन‘ प्रकरण…” – लेखिका : डॉ. सुनीता दोशी ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

महाराणी अहिल्याबाई होळकर

पुण्यात कल्याणी नगर येथे घडलेले ‘हीट अँड रन’ प्रकरण बरंच चर्चेत आहे सध्या…!सुरुवातीला मुलाला शिक्षा म्हणून 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगितला आणि समज देऊन सोडून दिलं ही चर्चा खूपच रंगली…!  आपल्या मद्यपान केलेल्या अल्पवयीन मुलाला…, जो नशेत अतिशय वेगाने गाडी चालवत होता…आणि त्याच्या हातून घडलेल्या अपघातात दोघांचा जीव गेला…त्याला वाचवण्यासाठी आजोबा आणि वडील गैरमार्गाचा वापर करत होते… पैशाने कायद्याला…माणुसकीला विकत घेऊ पहात होते…!  

या पार्श्वभूमीवर एक घटना खूपच विचार करण्यासारखी आहे…! 31 मे…राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती…!सर्व देशभर ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली…! त्यांच्याच जीवनात घडलेला एक प्रसंग या पार्श्वभूमीवर अतिशय बोलका आणि डोळ्यात अंजन घालणारा आहे…!

हा प्रसंग जरी त्या वडिलांना आणि आजोबांना सांगितला असता, तरी निबंध लिहिण्यापेक्षा आहे तो परिणामकारक झाला असता…. असं मात्र वाटत रहातं…! 

“राजमाता अहिल्यादेवी होळकर…!”एक आदर्श व्यक्तिमत्व …! दानशूर…कुशल प्रशासक … वीरांगना…अतिशय न्यायप्रिय… दूरदृष्टी असलेल्या… पुरोगामी विचाराच्या… शिवभक्त…आणि… प्रजाहितदक्ष…पुण्यश्लोक…  महाराणी  अहिल्यादेवी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या एक प्रसंग…

अहिल्यादेवी यांचा पुत्र मालोजी रथामधून जात असताना रस्त्यामध्ये एक वासरू बागडत उड्या मारत  रथासमोर येते… वासराला त्या रथाची धडक बसते आणि ते वासरू  मृत्यूमुखी पडते…!मालोजीराव तसेच पुढे निघून जातात…! जवळच त्या वासराची आई… म्हणजेच गाय उभी असते…! आपलं बाळ गेलेलं तिच्या लक्षात येते… अतिशय दुःखी अशी ती गाय त्या वासराभोवती गोल गोल फिरते आणि शेवटी त्या वासराच्या बाजूला बसून राहते…! काही वेळाने त्याच रस्त्यावरून अहिल्यादेवीचा रथ  जातो… त्यांना हे दृश्य दिसते… आणि लक्षात येते की कुठल्यातरी अपघातामध्ये हे वासरु गेलेले आहे…!  त्यांना अतिशय वाईट वाटते… चौकशी केल्यानंतर कळते की हे कृत्य आपल्या मुलाच्या हातून घडले आहे…! त्या  अतिशय संतापतात…! आणि अतिशय रागात घरी येतात…आपल्या सुनेला विचारतात….”जर एखादया आईसमोर तिच्या बाळाला कोणी आपल्या रथाखाली चिरडलं … आणि ती व्यक्ती न थांबता तशीच निघून गेली….तर काय न्याय द्यायला हवा…?”

सून  म्हणते…,”  ज्या पद्धतीने त्या व्यक्तीने  वासराला चिरडले …त्या पद्धतीनेच त्या व्यक्तीला देखील मृत्युदंड द्यायला हवा…!”

अहिल्यादेवी दरबारामध्ये मुलाला बोलवून घेतात आणि मृत्युदंडाची शिक्षा सुनावतात…! तो मृत्यू देखील ज्या पध्द्तीने वासराला चिरडले गेले…त्याच पध्द्तीने…!  मालोजीरावांना हात पाय बांधून रस्त्यावर टाकण्यात येते…! परंतु मालोजीरावांच्या अंगावर जो रथ घालायचा…त्याचे सारथ्य करायला कोणीच तयार होत नाही…! मालोजीरावांना माफ करावे म्हणून प्रजाजन अहिल्यादेवींना खूप विनंती करतात…! परंतु आता त्यांचा निर्णय झालेला असतो… त्यांनी एकदा दिलेला निर्णय परत बदलायचा विषयच नसतो…!    

शेवटी अहिल्यादेवी स्वतः हातात लगाम घेतात … त्या रथावर चढतात आणि त्या रथाचे सारथ्य करतात…! परंतु एक अद्भुत घटना त्या वेळेस घडते…! अहिल्यादेवींच्या रथासमोर ती गाय येऊन उभा रहाते…! कितीही हाकलून दिले तरी ती गाय पुन्हा पुन्हा त्या रथाला आडवी येते… ! जणू ती सांगते की…’ हे अपत्य विरहाचे दुःख फार वाईट आहे… एका आईच्या हातून आपल्या बाळाचा मृत्यू होऊ नये …आणि आईला हे दुःख सहन करायला लागू नये …! ‘ 

ह्या घटनेने सर्वजण अवाक होतात…!  अहिल्यादेवींची समजूत काढतात…! शेवटी अहिल्यादेवी आपल्या मुलाला माफ करतात…!

ही घटना ऐकून अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहतात…! प्रत्येक स्त्रीमध्ये एक ‘आई ‘असते…! त्या आईने दुसऱ्या आईला न्याय देण्यासाठी आपल्या स्वतःच्या मातृत्वाचा देखील विचार केला नाही…! आपल्या पोटच्या पोराला इतकी कठोर शिक्षा त्यांनी सुनावताना मातृत्वावर कर्तव्याने विजय मिळवला होता…! परंतु त्या क्षणी त्यांच्या मनामध्ये विचारांची किती वादळे उठली असतील…? मन किती खंबीर करावं लागलं असेल…!  खरंच विचार करण्यापलीकडेच आहे सारे …!

आज अशा न्यायाची खरंच खूप गरज आहे…पैशाने न्याय विकत घेऊ पाहणाऱ्यांसाठी…! आणि अशा इतिहास घडविणाऱ्या इतिहासातल्या घटना समाजापुढे ठेवण्याची गरज आहे…  पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींची जयंतीच्या निमित्ताने…!

हीच खरी अहिल्यादेवींनी वाहिलेली आदरांजली …आणि हेच कदाचित समाज-प्रबोधनही असेल…!

लेखिका : डॉ सुनिता दोशी

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आता द्या निकाल… – लेखक : ओशो ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ आता द्या निकाल… – लेखक : ओशो ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

रात्रीच्या गडद अंधारात चोर त्या घराच्या आवारात शिरला.

एका खिडकीतून अल्लाद आत शिरण्यासाठी तो आवाज न करता त्या खिडकीवर चढला आणि अचानक काड्काड् आवाज करत ती खिडकी मोडली, चोर खाली पडला, त्याचा पाय मोडला. घरमालक जागा झाला. त्याने चोराला रक्षकांच्या ताब्यात दिलं.

दुसऱ्या दिवशी भलतंच आक्रीत झालं. ‘ त्या घरमालकाने तकलादू खिडकी बनवल्यामुळेच आपला पाय मोडला, त्याची त्याने नुकसान भरपाई द्यायला हवी,’ असा खटलाच चोराने दाखल केला होता.

खटल्याच्या दिवशी न्यायालयात अभूतपूर्व गर्दी उसळली होती.

घरमालक न्यायाधिशाला म्हणाला, “ महाराज, हा काय उफराटा प्रकार आहे? हा माणूस माझ्या घरात चोरी करायला शिरत होता. तो माझं केवढं नुकसान करणार होता. त्यात त्याच्या चुकीने माझ्या घराची खिडकी मोडली आणि मीच नुकसान भरपाई द्यायची? “

न्यायाधिशाने चोराकडे पाहिलं. चोर म्हणाला, “ मी चोरी करणार होतो. केली नव्हती. यांचं नुकसान होणार होतं, झालेलं नाही. माझं नुकसान मात्र झालेलं आहे आणि ते यांच्या चुकीमुळे झालेलं आहे. कधीतरी खिडकीवर कोणी, भले चोर का होईना, चढू शकतो, याचा विचार करून मजबूत खिडकी बांधणं हे याचं काम नव्हतं का? “

न्यायाधीश म्हणाले, “ याचं म्हणणं बरोबर आहे. तुमचं काय म्हणणं आहे.? “

घरमालक म्हणाला, “ महाराज, मी हे घर बांधताना बांधकाम कंत्राटदाराला पूर्ण पैसे दिले होते. त्याने तकलादू बांधकाम केलं असेल, तर माझा काय दोष? “

कंत्राटदाराला न्यायालयात हजर केलं गेलं.

तो म्हणाला, “ मी पूर्ण पैसे घेतले. चांगला माल आणला. चांगले कारागीर आणले. त्यांना चांगले पैसे दिले. आता ही खिडकी बांधणाऱ्या कारागिराने तरीही चूक केली असेल, तर माझा काय दोष?”

कारागीराला न्यायालयात हजर केलं गेलं. 

तो म्हणाला, “ मी भिंत नीटच बांधली होती. त्यातली चौकट बसवताना सुताराने गडबड केलेली असणार. त्यात माझा काय दोष?”

सुतार न्यायालयात हजर झाला.

तो म्हणाला, “ महाराज, माझ्या हातून गडबड झालीये यात शंका नाही. पण, त्यात माझा दोष नाही. मी ही खिडकी बसवत असताना अगदी मोक्याच्या वेळेला एक रूपसुंदर स्त्री समोरून गेली. तिच्यामुळे माझं लक्ष विचलित झालं. तिने इंद्रधनुषी रंगाची ओढणी घेतली होती, हे मला अजूनही आठवतं. आता सांगा यात माझा काय दोष?”

त्या स्त्रीला बोलावलं गेलं. 

ती म्हणाली, “ मी त्या दिवशी तिथून गेले, हे खरंच आहे महाराज. पण, माझ्याकडे नीट पाहा. मी किती सामान्य रंगरूपाची स्त्री आहे. माझ्यासारख्या स्त्रीकडे कोणी रस्त्यात वळूनही पाहणार नाही. या सुताराचं माझ्याकडे लक्ष गेलं ते माझ्या इंद्रधनुषी दुपट्ट्यामुळे.” तिने तो झळझळीत दुपट्टा काढला आणि सगळं न्यायसभागार मंत्रमुग्ध झालं. खरंच तो दुपट्टा नजरबंदी करणारा होता. ती स्त्री म्हणाली, “ या दुपट्ट्याला हा रंग लावणारा रंगरेझच खरा दोषी आहे.”

“बोलवा त्याला,” न्यायाधिशांनी हुकूम दिला.

ती स्त्री लाजून म्हणाली, “ बोलवायचं कशाला? माझा पतीच आहे तो आणि या न्यायालयातच हजर आहे.” 

तिने पाय मोडलेल्या चोराकडे बोट दाखवलं आणि त्याने कपाळावर हात मारून घेतला.

लेखक – ओशो

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वाचन नसलेली पिढी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

📚 वाचतांना वेचलेले 📚

☆ वाचन नसलेली पिढी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

(वाचन नसलेली पिढी म्हणजे आशा नसलेली पिढी  (भारतीय अभियंत्याच्या पत्राचा उतारा))

“शांघायला जाणाऱ्या फ्लाइटवर, झोपेच्या वेळी, केबिनचे दिवे बंद होते; मी लोकांना iPads वापरून जागे करताना पाहिले, मुख्यतः आशियाई; ते सर्व गेम खेळत होते किंवा चित्रपट पहात होते.” 

खरंतर मी तो पॅटर्न पहिल्यापासून पाहिला.

जेव्हा मी फ्रँकफर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळावर होतो तेव्हा माझ्या लक्षात आले की बहुतेक जर्मन प्रवासी शांतपणे वाचत होते किंवा काम करत होते, तर बहुतेक आशियाई प्रवासी खरेदी करत होते आणि किंमतींची तुलना करत हसत होते.

आजकाल अनेक आशियाई लोकांना बसून पुस्तके वाचण्याचा धीर नाही. 

एकदा, एक फ्रेंच मित्र आणि मी एका रेल्वे स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत होतो आणि या मित्राने मला विचारले: “सर्व आशियाई चॅट किंवा इंटरनेट का सर्फ करतात, परंतु कोणीही पुस्तके का वाचत नाही?”.

मी आजूबाजूला पाहिले, आणि खरंच ते होते. 

लोक फोनवर बोलतात, मजकूर संदेश वाचतात, सोशल मीडियावर सर्फ करतात किंवा गेम खेळतात. 

ते मोठ्याने बोलण्यात किंवा सक्रिय असल्याचे ढोंग करण्यात व्यस्त आहेत; 

गहाळ असलेली एकमेव गोष्ट म्हणजे शांतता आणि विश्रांतीची भावना. 

ते नेहमी अधीर आणि चिडखोर, रागावलेले आणि तक्रार करणारे असतात…

प्रसारमाध्यमांच्या मते, चीनमध्ये सरासरी व्यक्ती प्रतिवर्षी केवळ ०.७ पुस्तके, व्हिएतनाममध्ये ०.८ पुस्तके, भारतात १.२ पुस्तके आणि कोरियामध्ये प्रतिवर्षी ७ पुस्तके वाचतात. 

केवळ जपान पाश्चात्य देशांशी तुलना करू शकतो ज्यात प्रति व्यक्ती प्रति वर्ष 40 पुस्तके आहेत; 

एकट्या रशियामध्ये प्रति व्यक्ती प्रति वर्ष 55 पुस्तके आहेत. 

2015 मध्ये, 44.6% जर्मन लोक आठवड्यातून किमान एक पुस्तक वाचतात – नॉर्डिक देशांसाठी समान संख्या.

आकडेवारी दर्शवते की वाचन नापसंत होण्याची तीन मुख्य कारणे आहेत.

📚 – एक म्हणजे लोकांची खालची संस्कृती (शिक्षण नव्हे). 

त्यामुळे लोक नेहमी भेटल्यावर खूप बोलतात आणि कंटाळा न येता दिवसभर गप्पा मारतात. 

ते नेहमी इतर लोकांच्या कथांबद्दल उत्सुक असतात, सतत सामाजिक नेटवर्क अद्यतनित करतात आणि संप्रेषणाच्या महत्त्वपूर्ण गरजा असतात.

📚 – दुसरे म्हणजे, त्यांना लहानपणापासून वाचनाची चांगली सवय लावली जात नाही. 

त्यांच्या पालकांना पुस्तके वाचण्याची सवय नसल्याने तरुणांना त्यांच्या जीवनाच्या सुरुवातीपासूनच त्यांच्या संगोपनात तसे वातावरण मिळत नाही. 

लक्षात ठेवा, मुलाचे व्यक्तिमत्त्व प्रामुख्याने कुटुंबाद्वारे घडवले जाते.

📚 – तिसरे म्हणजे ‘परीक्षाभिमुख शिक्षण’, त्यामुळे लहान मुलांना बाहेरची पुस्तके वाचायला वेळ आणि ऊर्जा मिळत नाही. 

बहुतेक ते पुस्तके देखील वाचतात, म्हणून ते परीक्षांसाठी असतात. 

जुन्या अभ्यासपद्धतीच्या वातावरणामुळे अभ्यासाची सवय लागणे, पदवी मिळवणे आणि नंतर वाचन करणे बंद झाले.

इस्त्राईल आणि हंगेरी हे जगातील सर्वाधिक वाचले जाणारे दोन देश आहेत. 

इस्रायलमधील सरासरी व्यक्ती वर्षाला ६४ पुस्तके वाचते. 

मुलांना समजायला लागल्यापासून, जवळजवळ प्रत्येक आई आपल्या मुलांना शिकवते: “पुस्तके हे शहाणपणाचे भांडार आहेत, जे पैसे, खजिना आणि शहाणपणापेक्षा अधिक मौल्यवान आहेत जे कोणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही.

हंगेरीमध्ये सुमारे 20,000 लायब्ररी आहेत आणि 500 लोकांमागे सरासरी एक लायब्ररी आहे; 

लायब्ररीत जाणे हे कॉफी शॉप किंवा सुपरमार्केटमध्ये जाण्याइतकेच चांगले आहे. 

हंगेरी हा जगातील सर्वात लक्षणीय पुस्तके वाचणारा देश आहे, ज्यात दरवर्षी 5 दशलक्ष लोक नियमितपणे वाचतात, देशाच्या लोकसंख्येच्या एक चतुर्थांशपेक्षा जास्त. 

ज्यू हे एकमेव लोक आहेत ज्यांना निरक्षर नाही; 

भिकाऱ्यांकडेही नेहमी पुस्तक असते. 

त्याच्या दृष्टीने पुस्तके वाचणे हा लोकांचा न्यायनिवाडा करण्याचा उत्कृष्ट गुण आहे.

जे लोक वाचतात त्यांची विचार करण्याची पद्धत खूप वेगळी असते आणि त्यांच्याकडे चमकदार कामगिरी नसली तरी त्यांची मानसिकता खूप चांगली असते. 

पुस्तकांचा केवळ व्यक्तीवर परिणाम होत नाही;त्याचा समाजावर परिणाम होतो.

ज्ञान ही शक्ती आहे आणि ज्ञान ही संपत्ती आहे.  जो देश किंवा व्यक्ती पुस्तके वाचणे आणि ज्ञान संपादन करणे याला महत्त्व देतो तो नेता असेल.

एक महान विद्वान एकदा म्हणाले: “एखाद्या व्यक्तीच्या विचारांच्या विकासाचा इतिहास हा त्याचा वाचन इतिहास आहे. किती लोक पुस्तके वाचतात आणि कोणत्या प्रकारची पुस्तके निवडतात हे ठरवते की समाजाचा विकास होईल की मागे राहील.”

लक्षात ठेवा: वाचनाशिवाय शर्यत ही आशा नसलेली शर्यत आहे.

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “त्या तरुतळी विसरले गीत …” – लेखिका : सुश्री माधुरी ताम्हाणे देव ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “त्या तरुतळी विसरले गीत …” – लेखिका : सुश्री माधुरी ताम्हाणे देव ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

आपल्या स्वतःच्या कवितेच्या दोन ओळी किंवा शब्द कुठे लिहून ठेवण्याआधी अगदी मनातल्या मनात हरवून जातात तेव्हा होणारी मनाची घालमेल शब्दात न सामावणारी असते. आपली कविता दुसऱ्याने स्वतःच्या नावाने किंवा नाव न देताच माध्यमावर दिली की जीवाची होणारी बेचैनीही शब्दातीत असते. एकूणच, कविता हरवणे हा अनुभव शब्दात व्यक्त करणे आणि ती व्याकुळ अवस्था इतरांपर्यंत पोहोचवणं सोपे नव्हे. 

परंतु कवी वा.रा कांत यांच्यासारखा  कवी कवितेचे हे हरवणं इतक्या उत्कटपणे काव्यातून व्यक्त करतो की त्या काव्याचं एक अविस्मरणीय असं विरहगीत म्हणूया किंवा भावगीत  पिढ्यान पिढ्या मनाचा ठाव घेत आहे. 

“त्या तरुतळी  विसरले गीत” हे वा.रा कांत यांचं गीत एका “हरवण्याच्या” अनुभवातून आकारलं आहे. वा. रा कांत हे नांदेडचे कवी सायकल घेऊन नोकरीच्या ठिकाणी  जात असत. हा रस्ता रानातून जात असे. तिथेच एका तळ्याकाठी असलेल्या  झाडाखाली बसून ते अनेकदा कविता लिहीत असत. या कविता किंवा सुचलेल्या ओळी एका वहीत लिहून ठेवत असत. एक दिवस घरी परतल्यावर आपण कवितांची वही  त्या झाडाखालीच विसरलो हे त्यांच्या लक्षात आलं. आणि मग मनाची झालेली घालमेल व्यक्त करताना शब्द त्यांच्या समर्थ लेखणीतून  आले –  

“ त्या तरुतळी विसरले गीत “ 

जेव्हा जेव्हा मी हे गीत ऐकत असे  तेव्हा अपुऱ्या राहिलेल्या भेटीची ही व्याकुळ आठवण आहे असं मला वाटत असे. “हरवलेल्या वही”ची ही गोष्ट कळल्यावर मात्र ह्या गीतातील शब्दांचे संदर्भ मनाला अधिकच अस्वस्थ करू लागले. 

आपली वही उद्या मिळेल का? ही. मनाची घालमेल सांगणार तरी कुणाला? मनाच्या या अवस्थेतून   वा,रा कांत यांच्यातील सृजनशील कवी कडून कशा ओळी लिहिल्या जातात बघा –  

त्या तरुतळी विसरले गीत

हृदय रिकामे घेऊनि फिरतो, 

इथे तिथे टेकीत

मुक्या मना मग भार भावना

स्वरातुनी चमकते वेदना

तप्त रणे तुडवीत हिंडतो, ती छाया आठवीत.

आपण आणखी कविता लिहू शकतो, लिहिल्या जातील इतकी विशाल प्रतिभा आपल्याकडे आहे हे जाणणाऱ्या कवीच्या मनात गेलेल्या कवितांची हुरहूर आहेच. 

“विशाल तरु तरी फांदी लवली”

दुसऱ्या दिवशी सकाळी साशंकपणेच ते त्या तळ्याकाठी   पोचतात तेव्हा काय आश्चर्य? 

त्यांची वही तिथे असतेच पण ती झाडाखाली नुसतीच पडलेली नाही. तर झाडाला रेलून आपल्या सख्याची  वाट बघत उभ्या असलेल्या एका सुंदर तरुणीच्या हातात ती वही आहे असे दृश्य त्यांना दिसते. आणि ते लिहून जातात – 

मदालसा तरुवरी रेलुनी

वाट बघे सखी अधिर लोचनी

पानजाळि सळसळे, वळे ती, मथित हृदय कवळीत

आणि त्या तरुणीचं वर्णन करताना शब्दचित्रच रेखातात –

पदर ढळे, कचपाश भुरभुरे

नव्या उभारित ऊर थरथरे

अधरी अमृत उतू जाय परि, पदरी हृदय व्यथीत.

वाट बघून ती तरुणी जणू शिणली आहे, थकलेली आहे. कवीची अवस्था तरी  कुठे वेगळी आहे? कवितेच्या वही साठी वणवण करून माझाही देह (तनु ) थकलेला आहे. मात्र  दोघांची परिस्थिती त्या क्षणी  अशी एक  अशी असली तरी दोघांच्याही हृदयातील  आकांक्षा मात्रवेगवेगळी आहे. दोघांच्यात असलेले हे साम्य आणि विरोधाभास  वा.रा  कांत किती सुंदर शब्दात लिहून गेलेत  –  

उभी उभी ती तरुतळि शिणली

भ्रमणी मम तनु थकली गळली

एक गीत, परी चरण विखुरले, द्विधा हृदय-संगीत तरुतळी गीत विसरल्यानंतर झालेली मनातील घालमेल उत्कटतेने व्यक्त करणारं भावगर्भ  असं  हे गीत यशवंत देवां सारख्या संवेदनशील संगीतकाराला भावणं हा आणखी एक सुंदर योग. कवीच्या भावना उत्कटपणे व्यक्त करणारं हे गीत यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलं  आणि ते गाण्यासाठी  साक्षात सुधीर फडके यांचा आवाज लाभावा? हा सुवर्ण योग ?  आपण आपल्या पुरते तरी याला रसिकांचे भाग्य समजूया.   

त्या तरुतळी विसरले गीत कवितेमागची कथा संपूर्णपणे  खरी असो वा नसो. तो विचार दूर सारून.

“ तप्त रणे तुडवीत हिंडतो” 

 “त्या तरुतळी विसरले गीत” 

..हे शब्द  सुधीर फडके यांच्या आवाजात कानावर येतात तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी  आपल्याला व्याकुळ आणि भावनावश करतात इतके मात्र खरे.    

लेखिका : सुश्री माधुरी ताम्हाणे देव

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares