मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एक छानशी गोष्ट – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

एक छानशी कथा – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

एका प्रवासी बोटीचा भर समुद्रात अपघात होतो.

त्याच बोटीवर एक जोडप (पती-पत्नी) प्रवास करत असतात. 

ते दोघेही एकमेकांचे जीव की प्राण असतात. बोटीच्या अपघातामुळे ते एकमेकांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात. 

त्यांची नजर आधारासाठी काहीतरी शोधण्यासाठी चहूकडे भीरभीरत असते. 

आणि अचानक त्यांना एक जीवरक्षक बोट दिसते. 

एका म्हणीत म्हटलेल आहे की, 

“डुबत्याला काठीचा आधार”

अगदी तसच होते, ते दोघेही जिवाच्या आकांतान त्या जीवरक्षक बोटीजवळ येतात.

परंतु त्यांची घोर निराशा होते.  त्यांना दिसत की, बोटीत फक्त एकच जागा शिल्लक आहे. 

पती, पत्नीला बुडत्या बोटीवर मागे ठेउन जीवरक्षक बोटीत उडी मारतो. 

पत्नी बुडत्या बोटी वर थांबते.

बोट पाण्याखाली जाण्याआधी ती पतीकड़े पाहून जीवाच्या आकांताने काही तरी ओरडून सांगण्यांचा प्रयत्न करते. 

शिक्षक गोष्ट सांगायचे थांबवतात. 

वर्गात निरव शांतता  

वर्गातील प्रत्तेक विद्यार्थी अगदी मन लावून तल्लीन होवून गोष्ट ऐकण्यात गुंग झालेला असतो. 

अनपेक्षितपणे शिक्षकांनी गोष्ट सांगायची का थांबवली हा प्रत्तेकालाच प्रश्न पडलेला असतो. आणि तेवढ्यात शिक्षक  वर्गातील मुलांना विचारतात की, 

पत्नी पतीला काय म्हणाली असेल?

बहुतेक विद्यार्थी तर्क करुन सांगतात की, पत्नी पतीला म्हणाली असेल, 

‘मला तुम्ही धोका दिलात, मी तुम्हाला ओळखलेच नाही, तुम्ही स्वार्थी आहात..!’ 

प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपआपली मते मांडली. तेवढ्यात शिक्षकांचे एका विद्यार्थ्याकडे लक्ष जाते. 

एक मुलगा मात्र गप्पच असतो.

शिक्षक त्याला विचारतात, “अरे, तुला काय वाटते ते पण सांग!”

तो मुलगा म्हणतो, 

“गुरुजी, मला वाटत, त़ी म्हणाली असेल, मुलांना सांभाळा..!”

शिक्षक चकित होउन विचारतात, “तुला ही गोष्ट माहीत आहे का?”

तो नकारार्थी मान हलवतो आणि म्हणतो, *”नाही गुरुजी, मला माहित नाही. पण; माझी आई वारली तेंव्हा शेवटच्या श्वासाला ती हेच म्हणाली होती!”

“तुझे उत्तर बरोबर आहे!”

शिक्षक हलकेच म्हणाले.

बोट बुडाली. पतीने घरी जाउन, मुलीला एकट्यानेच लहानाचे मोठे केल.

खूप वर्षानंतर, वार्धक्याने त्या पतीला जेंव्हा मरण आले तेंव्हा, त्याच्या पश्चात राहिलेले सामान आवरत असताना, त्याच्या मुलीला एक डायरी सापडते.

त्यातून असे समजते की, तीच्या आईला आधीच दुर्धर आजार झालेला असतो. 

आणि ती त्यातून वाचणार नसते. त्यामुळे पतीला स्वत: जीवंत रहाण्याव्यतिरिक्त दूसरा पर्यायच नसतो.

त्या डायरीत पतीने पुढे लिहिलेले असते, “तुझ्या शेजारीच जलसमाधी घ्यायची माझी किती इच्छा होती. पण आपल्या मुलीसाठी मला तुला त्या सागराच्या तळाशी एकटीलाच कायमसाठी सोडून याव लागल!”

ही गोष्ट आपल्याला सांगण्या मागचा एवढाच उद्देश की,  चांगल्या किंवा वाईट कृतीच्या पाठीमागे, कधी कधी मोठी गुंतागुंत असते. जी आपल्या सहज लक्षात येत नाही.

त्यामुळे वरवर पाहून आपण कुणाहीबद्दल लगेच मत बनवून घेउ नये.

जे कोणत्याही कामात पुढाकार घेतात, ते मुर्ख असतात म्हणून नव्हे तर त्याना त्यांची जबाबदारी कळते म्हणून.

जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात, त्यांची चुक असते म्हणून नव्हे,तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून.

जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला खरा मित्र मानतात म्हणुन…!

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वास्तवातली मूल्ये… लेखक : श्री ओंकार दाभोडकर ☆ प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर ☆

सौ. राधिका भांडारकर

? वाचताना वेचलेले ?

☆ वास्तवातली मूल्ये… लेखक : श्री ओंकार दाभोडकर ☆ प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर ☆

काल लोकलमधे ३-४ मंडळींमध्ये रावणाचं कौतुक करणारं डिस्कशन सुरू होतं. प्रोपागंडा रुजत रुजत सार्वत्रिक मत कसं तयार होतं याचं लाईव्ह प्रात्यक्षिक बघितलं. खोटे हिरो निर्माण करण्याचा प्रकार हसून, गंमत म्हणून सोडून देण्यात आला की सामान्य माणूस कसा घडत जातो याची जाणीव अधिकच ठळक झाली. 

कथा कादंबऱ्या म्हणून प्रसिद्ध झालेली पुस्तकं गाजतात, चर्चा होतात आणि वास्तवाचा अन त्याहून महत्वाचं – मूलभूत मूल्यांचा – सगळा कचरा होऊन बसतो.

रावण त्याच्या गुणांमुळे आदर्श वाटावा असं बरंच काही होतंच त्यात. ज्ञानी, तपस्वी, कर्तबगार, योद्धा…बऱ्याच अनुकरणीय गोष्टी होत्या. रामायणात त्यांची दखल घेतली गेली आहेच. परंतु रावण समाजासाठी आदर्श व्यक्तिमत्व होऊ शकत नाही. कारण त्याच्या दुर्गुणांमुळे सगळे सद्गुण मागे पडले.

अहंकारी, दुराग्रही, वासनांध – हेच रावणाचं खरं रूप आहे. हे रूप न ओळखता रावण ग्रेट वाटायला लागला तर ती फक्त सुरुवात असते. हळूहळू आपल्याला श्रीराम कमी महत्वाचे वाटायला लागतात. मग श्रीरामांचे गुण – ज्यांमुळे श्रीराम “श्रीराम” ठरतात – ते झाकोळले जायला लागतात. छत्रपती शिवराय याच श्रीरामाचं चरित्र शिकून स्वराज्य निर्मितीसाठी प्रेरित झाले हे आपण विसरायला लागतो. 

हळूहळू नाळ तुटत जाते.

रावणाने सीता मातेला तिच्या मर्जी विरुद्ध स्पर्श न करणे मोठं आदर्श वर्तन समजलं जातं. एका महिलेच्या अपहरणाचं समर्थन करायला “फक्त युद्ध टेक्निक म्हणून”, “बहिणीच्या अपमानाचा बदला म्हणून” वगैरे कारणं दिली जातात.

मग श्रीरामांनी सीतेची परीक्षा घेतली, प्रेग्नन्ट बायको जंगलात सोडली…हे सगळं खटकायला लागतं.

पण आपल्याला खरी स्टोरी माहितीच नसते. सांगितली गेलेली नसते. त्या स्टोरीचे पर्स्पेक्टिव्हच समजावून सांगितले जात नाहीत. प्रोपागंडा सशक्त होत जातो.

रावणाने सीता मातेला स्पर्श करण्यामागे त्याचं चरित्र नव्हे – हतबलता होती. 

रंभेवर केलेल्या बलात्कारा नंतर चिडून नलकुबेराने “यापुढे कुठल्याही स्त्रीला तिच्या इच्छेशिवाय स्पर्श जरी केलास तरी भस्म होशील” हा शाप दिला होता रावणाला. रावण “असाच” होता. विलासी, भोक्ता, बलात्कारी. राजा असणं, बलवान असणं रावणाने “असं” मिरवलं. वाट्टेल त्या स्त्रीचा, आसक्तीचा भोग घेऊन. (वाल्मिकी रामायणात, ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाल्यानंतर रावणाने त्रिलोकात माजवलेला हाहाकार स्पष्ट मांडला आहे. स्त्रियांच्या अपहरणासकट. सीतेला आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न करताना रावण हीच शेखी मिरवतो.)

दुसरीकडे राजपुत्र श्रीराम.

पत्नी अदृश्य झाली म्हणून “जाऊ दे!” म्हणून दुसरं लग्न न करणारा. तिच्यासाठी उद्विग्न होणारा. तिला शोधत भटकणारा. ३००० किलोमीटर पायपीट करून अपहरणकर्त्या बरोबर युद्ध करून तिला मुक्त करणारा. 

आणि आपल्या पत्नीवर अमर्याद प्रेम असूनही – स्वतःचं राजकीय, जबाबदार स्थान न विसरणारा.

जनतेचा आपल्या राणीवर विश्वास असायला हवा हे ओळखणारा.

सीता एका रामाची बायको नव्हती फक्त. ती महाराणी पदावर विराजमान होती. सिंहासनावर बसलेला राजा विष्णूचा अवतार मानून त्याला दिशादर्शक मानणाऱ्या समाजाचा काळ होता तो. तिच्या पोटी जन्मणारं अपत्य पुढे सिंहासनावर बसणार होतं. सीता त्या राज्याची माता होती.

जनतेचं मन मातेबद्दल कलुषित झालं असेल तर लोक पित्याला मानतील?

सिंहासनावर त्यांची श्रद्धा टिकून राहील? स्थैर्य असेल राज्यात? 

मुळात असं राज्य टिकेल?

जनतेला काही कळत नाही – असं म्हणून सोडून देता येत नसतं. सिंहासनावर बसलेल्या राजाला – जर तो रावणासारखा उन्मत्त, बेफिकीर, बदफैली नसेल तर – हा सगळा विचार करावा लागतो. तेच त्याचं पहिलं कर्तव्य असतं. तो नवरा नंतर असतो – सर्वात आधी तो जनतेचा राजा, प्रतिपाळ करणारा असतो.

म्हणून त्याने स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी अतिशय कठोर नियम पाळायचे असतात.

हे चूक नाही का? सीतेवर हा अन्याय नाही का? लव-कुशवर हा अन्याय नाही का?

आहेच. रामासकट – सीता, लव-कुश या स्वतंत्र व्यक्तींवर हा अन्याय नक्कीच आहे. पण राजा – राणी – राजकुमार यांचं हे कर्तव्य आहे. दुर्दैवी वाटेल कदाचित. पण स्वायत्त यंत्रणांची विश्वासार्हता टिकवायची असेल तर हे अत्यावश्यक आहे.

आधुनिक काळात हे कसंसंच वाटत असेल कदाचित. पण आजही इंग्रजीत जेव्हा Caesar’s wife must be above suspicion म्हटलं जातं तेव्हा कौतुकाने मान डोलावतोच आपण. सिझरच्या बाबतीत झटकन सहमत होणारे आपण, श्रीरामांनी स्वतःच्या आवडीनिवडीवर, स्वातंत्र्यावर, सुखावर सतत, जन्मभर पाणी सोडलं हे सहजच विसरून जातो.

महत्वाच्या राजकीय पदावर विराजमान असलेल्याना व्यक्तिस्वातंत्र्य एका मर्यादेतच असणार. त्यांच्यासाठी नैतिकतेचे नियम अधिक कठोर, अधिक अरुंद असणार.

पूर्वीही असंच होतं – आजही असंच आहे. (किमान असायला हवं!)

वाट्टेल तसं वागण्याचं स्वातंत्र्य सामान्य व्यक्तीला ठीकाय.

राजाला ते स्वातंत्र्य नाही.

सीझरला ही नाही, त्याच्या पत्नीला ही नाही.

हे भान श्रीरामांना होतं.

म्हणून ते श्रीराम होते.

सत्तेत धुंद झालेला, वाट्टेल तेव्हा वाट्टेल ते करणारा रावण – म्हणूनच – पंडित, महादेवाचा भक्त वगैरे असूनही – आपला आदर्श होऊच शकत नाही.

म्हणूनच – राम की रावण, अर्जुन की कर्ण – हा निर्णय कादंबऱ्या वाचून करू नये.

मूळ चरित्र वाचून, समजून मग करावा.

कारण मुद्दा राम की रावण या दोन व्यक्तींचा नाहीच.

तो तसा कधीच नसतो.

मुद्दा या दोन्ही नावांमागील मूल्यांचा असतो.

ती मूल्यं सर्वात महत्वाची.

म्हणूनच श्रीराम महत्वाचे!

जय श्रीराम!

लेखक : श्री ओंकार दाभोडकर

प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ’आई ही आई असते‘ — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. बिल्वा शुभम् अकोलकर ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ ’आई ही आई असते‘ — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. बिल्वा शुभम् अकोलकर 

– जराशी गंमत. 

  • आयझॅक-न्यूटनची आई : पण खायच्या आधी ते सफरचंद स्वच्छ धुतलंस तरी का??
  • आर्किमिडीजची आई : गाढवा ! रस्त्यावर नागडा पळत जायला लाज वाटली नाही का? आणि ही पोरगी, युरेका, आहे तरी कोण?
  • एडिसनची आई : अर्थात मला फार अभिमान वाटतो तुझा, इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावल्याबद्दल. पण आता घालव तो दिवा आणि झोप मुकाट्यानं !
  • जेम्स वॅटची आई : सारखं झाकण उडताना आणि पडताना बघत राहिलास, तर तो भात करपेल की रे टोणग्या! गॅस बंद कर आधी तो!
  • ग्रॅहम बेलची आई : ह्या डबड्याचा शोध लावलास ते ठीक. पण याद राख, पोरी बाळींनी रात्रीअपरात्री फोन केले तर मला चा ल णा र नाही!
  • मोनालीसाची आई : तुझ्या दातांच्या क्लिपांवर इतका खर्च करून शेवटी असं मोजकंच हसलीस होय!
  • गॅलेलियोची आई : मेल्या! तुझ्या त्या टेलेस्कोपचा उपयोगच काय, जर त्यातून माझं मिलानोमधलं माहेर दिसत नसेल तर??
  • कोलंबसची आई : कुठेही जा, कितीही फिर, पण घरी एक चार ओळींचं पत्र खरडायला बिघडतं काय म्हणते मी?!
  • मायकल अँजेलोची आई : इतर पोरांसारखा भिंतीवर रेघोट्या मार रे. ते छतावरचे राडे साफ करायला कंबरडं मोडतंय की माझं!
  • बिल गेट्सची आई : दिवसभर त्या कॉम्प्युटरला चिकटून असतोस, हरकत नाही. पण अडल्ट साईट बघताना दिसलास तर माझ्याशी गाठ आहे, सांगून ठेवते !
  • फॅरेनहाइटची आई : त्या उकळत्या पाण्याशी खेळत बसलास तर मी चहा कधी टाकणार?!
  • अलबर्ट आईनस्टाइनची आई : कॉलेजचा ग्रुप फोटो आहे बाळा. जरा डोक्याला स्टायलिंग जेल वगैरे काहीतरी लाव की!

~~~~~●●○○■■○○●●~~~~~

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कालजयी…” – लेखक : प्रा. डॉ. श्रीकांत तारे ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “कालजयी…” – लेखक : प्रा. डॉ. श्रीकांत तारे ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

वपुंसोबत शेअर केलेलं असंख्य अविस्मरणीय क्षण मी मनाच्या गाभाऱ्यांत जपून ठेवले आहेत. मधूनच कुणीतरी भेटतं, वपुंचा विषय निघतो, नवीन काही आठवणी बाहेर येतात, अलगद मी भूतकाळांत शिरतो. ‘ज्या चहेत्यांमुळे आज आपण एका विशिष्ट उंचीला पोहोचलोय, ते चहेते म्हणजे आपलं सर्वस्व’ हे ब्रीदवाक्य असणारा आणि माणुसकी जपत आभाळाची ऊंची गाठणारा असा एक ‘कालजयी’ माणूस त्याच्या निर्वाणापर्यंत आपल्या मित्रपरिवारांत होता याकरता स्वत:चाच हेवा वाटू लागतो.

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमांत, मंगला गोडबोल्यांची मुलाखत घ्यायला आलेली लेखिका नीलिमा बोरवणकर भेटली. कार्यक्रमानंतर एकत्र बसून जेवताना मी वपुंचं नाव घेतलं आणि नीलिमा रोमांचित झाली. खांदे उडवत म्हणाली ,

‘वपुंच्या ऐन उमेदीतील हा किस्सा तुला ठाऊक नसणार’. प्रीमियर ऑटोमोटिव्ह कंपनीचे उपाध्यक्ष होते केशव पोळ. पुण्यात कोथरूडला रहायचे. वृद्धत्वाच्या उंबरठ्यावर किडनी बिघडल्या आणि आठवड्यातून दोनदा डायलिसीस करायचा सल्ला डॉक्टरांनी दिला.’

‘बाप रे, वय वाढत गेलं की डायलिसीस कठीण होत जातं.’ मी ऐकीव माहितीवर ज्ञान पाजळलं.

‘हो ना. त्यातून तीस वर्षांपूर्वीचं  डायलिसिस आजसारखं सोपं नव्हतं. पेशंटचे हाल व्हायचे. दोन दिवस दवाखान्यात रहावं लागायचं. घरी आलं की पुढल्या डायलिसिसची मानसिक तयारी करावी लागायची.

दवाखान्यातील त्रासाच्या धसक्यानं रात्र रात्र झोप लागायची नाही. पोळांची पत्नी मग वपुंच्या कथाकथनाची कॅसेट त्यांच्या डोक्याशी लावून त्यांचे पाय चेपत बसायची, वपुंनी सांगितलेली कथा डोक्यात घोळवीत, पोळ झोपी जायचे.’

माझ्या चेहऱ्यावर स्मित आलं. वपुंच्या कॅसेट्ची किमया मी स्वत: कितीदातरी अनुभवली आहे. एकबोटे, भदे, दामले, नळात जाऊन बसलेली भुताची पोरं वगैरे पात्रं, त्यांच्या तोंडचे संवाद मला अक्षरश: तोंडपाठ होते. कॅसेटच्या रूपाने वपु आमच्या घरांत शिरले आणि आमच्या कुटुंबाचा एक भाग झाले. मी नीलिमाला हे सारं सांगणारच होतो, तर मला हाताने थांबवत ती म्हणली,

‘थांब, रे, ही नुसती प्रस्तावना होती, खरा किस्सा तर पुढे आहे. पोळांची दगदग कमी व्हावी म्हणून प्रीमियर कंपनीनं त्यांना घरीच डायलिसीसचं मशिन बसवून दिलं. ओळखीचे एक डॉक्टर, बरोबरीला एक सहाय्यक, एक नर्स अशी टीम यायची, पोळांना घरीच डायलिसिस लावलं जायचं. गंमत म्हणजे, या दरम्यानही वपुंच्या कथाकथनाची कॅसेट त्यांच्या डोक्याशी लावून त्यांचं दुखणं हलकं करण्याचा प्रयत्न केला जायचा.’

मी ऐकतच राहिलो. तीस वर्षापूर्वी घरच्या घरी घरी डायलिसीस करता यायचं ही बातमी माझ्यासाठी आजही थक्क करणारी होती. मी माझं आश्चर्य नीलिमाला बोलून दाखवलं आणि तिनं समोरच्या टेबलवर हलकीशी थाप मारली.

‘बरोबर हेच वपुंना वाटलं. म्हणजे झालं काय की पोळांच्या पत्नीने वपुंना फोन केला एकदा. नवऱ्याचा आजार, घरी लावलेली मशीन, डायलिसीसचे निश्चित दिवस. हे सगळं बोलून झाल्यावर त्यांनी वपुंचे मनःपुर्वक आभार मानले. तुमच्या कथांचा आणि त्या रंगवून सागणाऱ्या तुमच्या आवाजाचा खूप आधार वाटतो माझ्या नवऱ्याला, डायलिसीस होत असतां मी त्यांचे पाय चेपते पण त्यांच्या चेहऱ्यावर स्मित येतं ते तुमच्या आवाजाने. तुमचे ऋण फेडणं कठीण आहे वगैरे बोलल्या. वपुंनीही अगत्याने पोळांच्या प्रकृतीची माहिती करून घेतली, बाईंना धीर दिला. डोळे पुसतच, अतीव समाधानाने बाईंनी फोन ठेवला.’

निलीमा बोलत होती आणि मला वपुंबरोबर माझे टेलिफोनवर घडणारे संवाद आठवत होते. आपल्या चहेत्यांचे फोन घेताना एक नैसर्गिक आनंद त्यांच्या प्रत्येक शब्दांत जाणवायचा. वाचकाने केलेली त्यांच्या लेखनाची तारीफ, समीक्षा, आलोचना, त्याचे व्यक्तिगत प्रश्न, सल्ले, वपु श्रद्धेनं ऐकायचे. एखाद्या वाचकाशी बोलताना त्यांनी वेळेचा विचार केलेला माझ्या ऐकिवात नाही. वपुंच्या मधाळ आवाजाने, आणि आपण त्यांचे ‘खास’ आहोत या जाणीवेनं तृप्त होऊन वाचक फोन ठेवायचा. आठवून माझ्या चेहऱ्यावर आगळी चमक आली असावी, कारण आणि नीलिमा हसली. माझ्या मनातले विचार तिने नेमके ओळखले. माझी उत्कंठा पुरेशी ताणली गेलीय याची खात्री करून घेत तिने पुन्हा सुरुवात केली,

‘तर, या टेलिफोन संवादानंतर दोनेक आठवडे उलटले आणि एके दिवशी अचानक, वपुंचा फोन आला पोळांकडे. कथाकथनाच्या कार्यक्रमा निमित्त पुण्यांत येतोय, कार्यक्रम रात्री आहे, पण पोळसाहेबांच्या डायलिसीसचा दिवस असल्याने डायलिसीस मशीन ऑपरेट होताना बघण्याची इच्छा आहे अश्या अर्थाचा तो फोन होता. वपु आपल्या घरी येणार या नुसत्या कल्पनेनं पोळांकडे उत्साहाला उधाण आलं. त्याकाळी मोबाईल हातात आले नव्हते पण मुंबईहून ते येणार म्हणजे मुंबईहून कितीही लवकर निघाले तरी सकाळी दहा साडे दहाच्या आधी त्यांचं येणं शक्य नाही असा अंदाज पोळ कुटुंबीयांनी बांधला. आपला आवडता लेखक, कथाकथनसम्राट प्रत्यक्ष आपल्या घरी येणार म्हणून शक्तिहीन पोळही वेगळ्याच विश्वात वावरत होते. आणि तुला गंमत सांगते श्रीकांत, सकाळी आठ वाजताच पोळांच्या दारांत वपु हजर होते. भल्या पहाटे चार वाजता त्यांनी मुंबई सोडलं आणि सकाळी लवकर डायलिसीस करायचं असतं हे ठाऊक असल्यामुळे स्पेशल टॅक्सी करून वपुंनी पोळांची ही वेळ गाठली.’

‘माय गॉड. व्हेरी इंटरेस्टिंग.’

‘हो ना. पोळांकडे हीsSSS धांदल. डॉक्टर येऊन बसलेले, सहायक कामाला लागले आणि वपु घरात. एका खुर्चीवर शरीराचा डॉक्टर बसलेला तर दुसरीवर मनाचा. श्री व सौ पोळ यांना तर काय करावं सुचेना,डायलिसीस नित्याचं असलं तरी आज उडालेली त्यांची तारांबळ काही वेगळीच होती.’

निलिमाच्या कथेत मी गुंगत चाललो. पोळ कुटुंब, वपु आणि डॉक्टर यांचे सोबत एका खुर्चीवर मीही जाऊन बसलो. पोळांकडील गड्याने वपुंसोबत मलाही चहा दिला, घड्याळाकडे बघत असलेल्या डॉक्टरांना आग्रहाने मी चहा दिला, वातावरण अधिकाधिक खेळकर करणाऱ्या मस्त गप्पा मारत वपुंनी चहा संपवला, आपला आजार विसरून पोळ, वपुंच्या बोलण्याला, कोट्यांना खळखळून दाद देताहेत, टाळी घेण्यासाठी पुढे केलेला हात माझा आहे कि वपुंचा याकडे लक्ष न देता उत्साहाने टाळी देताहेत हे सारं मला स्पष्ट दिसत होतं. वपु माझ्या घरी आल्यावर होणारी धावपळ आठवत, काही वेळासाठी मी पोळांच्या घरचा एक सदस्य झालो. निलिमाचंही असचं काहीसं झालं होतं. या क्षणी माझ्याबरोबर बहुधा तीही पोळांकडे पोहोचली असावी. तिचा स्वर गंभीर झाला. रणांगणावरील देखावा धृतराष्ट्राला सांगताना संजयचा झाला असेल तसा.

‘तर डायलिसीसची तयारी झाली, पोळांना पलंगावर झोपवलं, सौ पोळांनी कपाटातून कथाकथनाची कॅसेट काढली आणि टेपरेकॉर्डरच्या खटक्याचा आवाज ऐकून, आतापर्यंत डायलिसीस मशीनचं सूक्ष्म निरीक्षण करत असलेले वपु अचानक पलंगापाशी आले. सौ पोळांना थांबवत म्हणाले, आज कॅसेट नाही, वपु आज स्वत: पोळांजवळ बसून नवीन कथा त्यांना सांगतील. सौ पोळ ह्बकल्याच हे ऐकून, मग भानावर येत त्यांनी गड्याला खुर्ची लावायला सांगितली, पोळांच्या डोक्याशी खुर्ची ठेवली गेली, आणि वपुंनी नम्रपणे ती खुर्ची नाकारली. सौ पोळांसाठी राखीव खुर्चीवर पोळांच्या पायाशी बसू द्यायची त्यांनी विनंती केली आणि सौ पोळ गहिवरल्या. डोळे पुसतच त्यांनी पायथ्याची खुर्ची रिकामी केली. वपुंची कथा प्रत्यक्ष त्यांचेकडून फक्त आपल्याला ऐकायला मिळणार या अवर्णनीय आनंदानं डॉक्टर, त्यांचे सहकारी, सौ पोळ प्रचंड भारावले. पोळांचं डायलिसीस सुरु झालं, त्यांच्या पायाशी वपु बसले, आपलं चिरपरिचित स्मित चेहऱ्यावर खेळवीत, धीरगंभीर आवाजांत त्यांनी कथा सांगायला सुरुवात केली.’

किस्सा सांगता सांगता नीलिमा थबकली. शब्दांची जुळवाजुळव तिला करावी लागत असावी. ‘श्रीकांत, आणि….आणि कथा सांगता सांगता वपु चक्क पोळांचे पाय चेपू लागले. चारच श्रोते, पण सारेच अंतर्बाह्य थरारले, स्वप्नातही कल्पना न करू शकणारं दृश्य आपण आज बघतोय याची जाणीव तिथल्या साऱ्यांनाच होत होती. वपुंची कथा विनोदी असूनही श्री व सौ पोळांच्या डोळ्याला धार लागली.’

किस्सा संपवताना निलिमाच्या अंगावरील रोमांच मला स्पष्ट दिसत होता. माझ्या तर संवेदनाच खुंटल्या होत्या. मागे कधीतरी वपुंशी बोलत असतां, ’माझ्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ कथाकथनाच्या प्रयोगाला फक्त चारच श्रोते हजर होते’ असं त्यांनी म्हटलेलं मला नेमकं तेव्हाच आठवलं, कधीच सुटणार नाही म्हणून मनाच्या कोपऱ्यांत दडवून ठेवलेलं कोडं अचानक उलगडलं.

माणसं समजून घेत त्यांना आनंदात ठेवण्याची सातत्याने धडपड करीत जगलेल्या या ग्रेट लेखकाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

लेखक : प्रा डॉ श्रीकांत तारे

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ लहानपणीची अर्धी राहिलेली गोष्ट… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ लहानपणीची अर्धी राहिलेली गोष्ट… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

एक होती चिमणी आणि एक होता कावळा. 

चिमणीचं घर होत मेणाच, याउलट कावळयाचं घर शेणाचं होतं. 

एक दिवस काय झालं आकाशात मोठे मोठे काळे ढग आले. सोसाटयाचा वारा सुटला. टप् टप् पाऊस पडू लागला. 

झाडे भिजली. जमिनीवरून धो धो पाणी वहायला लागलं. 

कावळयाच घर होत शेणाच, ते गेले  पाण्यात वाहून, कावळा काकडला. आता कुठे जाव बर? एवढयात त्याला आठवलं, 

चिमणीच घर आहे शेजारीच. मग कावळा आला चिमणीकडे. 

पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते. ‘चिऊताई, चिऊताई, दार उघड !’ 

चिमणी आतून म्हणाली ‘थांब माझ्या बाळाला काजळ-पावडर लावते’

थोडावेळ थांबून पुन्हा कावळयाने कडी वाजवली ‘चिऊताई, चिऊताई, दार उघड !’ 

चिमणी आतून म्हणाली ‘थांब माझ्या बाळाला झोपवते’ इकडे कावळयाला खूप भूक लागली होती. 

पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. काय करतो बिचारा! एवढंस तोंड करून कुडकुडत उभा राहिला पण चिमणीने काही केल्या दार उघडले नाही.

 गोष्टीचा पुर्ण केलेला उत्तरार्ध – 

चिमणीचे सगळे काम आटोपले

ती जरा निवांत झाली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की, 

अरेच्च्या! आपण अजून कावळ्यासाठी दारच उघडलेलं नाही. 

तिला विलक्षण अपराधी वाटलं. 

तिनं बंद दारामागचा कानोसा घेतला. दाराबाहेर शांतता होती. 

ती शांतता चिमणीला असह्य झाली. तिनं तत्परतेनं दार उघडलं. दाराबाहेर कावळा नव्हता. तिने आजू बाजूला फिरून पाहिलं, कावळा कुठेही नव्हता.

‘गेला असेल कुठेतरी… येईल परत’ 

…. तिने स्वत:च्या मनाची समजूत काढली. 

मात्र, रात्र मावळली… दिवस उगवला, संध्याकाळ झाली आणि परत रात्र आली तरी कावळ्याचा काही पत्ताच नव्हता. 

चिमणीचं मन आज कशातच रमेना … बाळाला न्हाऊ घालण्यातही नाही आणि बाळाला गंध-पावडर करण्यातही नाही … 

कारण एव्हाना तिला सवय झाली होती …. कावळ्याने बंद दारावर केलेल्या टकटकीची …… 

तो आवाज असा काही कानात साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिने दारावर टकटक झालीय असं समजून दार उघडलं होतं आणि बाहेर कोणी नाही हे पाहून निराशेने बंद केलं होतं… 

अनेक दिवस उलटले …

चिमणीच्या मनातून काही कावळा जाईना. 

मग तिने कावळ्याचा शोध घ्यायचाच असं ठरवून घरट्याबाहेर पाऊल ठेवलं. मजल दरमजल करत फिरताना थकून एका झाडाच्या फांदीवर विश्रांती घेण्यासाठी ती थांबली. 

एवढ्यात त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदीवरून चिरपरिचित आवाज तिच्या कानावर पडला… 

तो ‘कावळ्याचा’ आवाज होता. तो आवाज ऐकून चिमणीला काय आनंद झाला. सारा थकवा, सारा शीण कुठल्या कुठे पळाला. 

तिने मोठ्या उत्साहाने त्या फांदीच्या दिशेने झेप घेतली. पहाते तर काय! 

कावळा आपल्या घरट्यात आपल्या पिल्लांसोबत आनंदाने मौज मस्ती करत होता. 

कावळ्याचं लक्ष चिमणीकडे गेलं. चिमणीला पाहून त्याला फार आनंद झाला. तो आनंदाने म्हणाला, 

‘या या चिमणाबाई. तुमचं स्वागत आहे आमच्या घरट्यात. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. बोला, काय करू तुमच्यासाठी?’ 

कावळ्याचं ते अगत्य पाहून चिमणी खूप ओशाळली. म्हणाली,

– ‘तुला राग नाही आला माझा?’

– का यावा? 

– मी माझ्यात विश्वात गुंग होते म्हणून?

– छे छे ! प्रत्येकाचं आपलं असं स्वतंत्र विश्व असतं.. जसं तुझं होतं. 

तुला त्यात माझी गरज कधीच नव्हती 

माझी ती गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलो. पण नंतर मला माझी चूक कळली. 

माझी गरज भागवण्यासाठी तू तुझ्या विश्वातून बाहेर येउन मला साथ देणं किंवा तुझ्या विश्वात मला प्रवेश देणं या दोन्हीही गोष्टी ‘अतिक्रमणासारख्याच’ घडल्या असत्या नाही का?

. ..  आणि कुणाच्याही वस्तूवर, अधिकारावर, भावविश्वावर ‘अतिक्रमण’ करणे चूकच नाही का?

.. ..  म्हणून मग मी स्वत:च वजा व्हायचं ठरवलं आणि निघालो एकटाच …. तुझ्या विश्वापासून दूर.

– मला एकट करून? अरे, मला सवय झालीय आता तुझी.

– चिमणाबाई, या जगात एकट कोणीच नसतं. 

जेव्हा आपण एकटे आहोत असं वाटतं ना तेव्हा तो एकांतच असतो आपला सोबती, जो दाखवत असतो आपल्याला वाट ..  आयुष्यातल्या पुढच्या प्रवासाची . मलाही दाखवली त्याने आणि बघ ……. आज मी किती आनंदी आहे … माझ्या ‘घरट्यात’… माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या ‘माझ्या माणसांमध्ये’

चिमणी नि:शब्द होऊन तिथून निघाली तेव्हा कावळा तिला एवढंच म्हणाला –

— चिमणाबाई, माझ्या घरट्यात तू केव्हाही येऊ शकतेस हो. तुझी टकटक ऐकून मी लगेच दार उघडेल … क्षणाचाही विलंब न करता.

चिमणीचे डोळे पाणावले… भरल्या कंठाने निरोप घेऊन तिने परतीची झेप घेतली आपल्या घरट्याकडे… 

पण आज तिच्या पंखात पूर्वीइतकं बळ राहिलं नव्हतं….

आपल्या सगळ्यांचीच अवस्था ना थोड्याफार प्रमाणात त्या चिमणाबाई सारखी झालीय. 

– म्हणजे ?

– म्हणजे कुणीतरी आपलं माणूस आर्तपणे आपल्याला साद घालतंय हे आपल्या ध्यानीच नसतं. 

ह्या आपल्या माणसांमध्ये भाऊ, बहिण, मित्र, मैत्रीण आई, वडील बऱ्याचदा पोटची मुलंही असू शकतात…

त्यांची आर्त साद आपल्याला ऐकूच येत नाही

…. म्हणजे ते पोटतिडकीने साद घालतात आणि आपण म्हणतो 

…’थांब मला जरा  करिअर करु दे…. थांब जरा मला आता घर घ्यायचय… थांब जरा मला आता कार घ्यायचीय … थांब मला काम आहे … थांब मला विश्रांती घ्यायची आहे … थांब जरा मला आता ….’ आणि मग ही जंत्री वाढतच जाते.

त्यांची सहन शक्ती संपते … ते त्यांचं वेगळं विश्व तयार करतात… त्या विश्वात आपल्याला स्थान नसतं… आपल्या ते लक्षात नसतं आणि जेव्हा येतं तेव्हा …. 

.. .. आपण फार एकटे झालेले असतो…. !!

– आणि असं होऊ नये असं वाटत असेल तर? 

मला कोणाचीच  गरज नाही हा अहंपणा बाळगू नका 

– वेळीच ‘टकटक’ ऐकायला शिका.

वेळ प्रत्येकाची येते।।.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “निबंध…” – कवी : एडवोकेट मंजित राऊत ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “निबंध…” – कवी : एडवोकेट मंजित राऊत ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

एक निबंध लिहू का सर?

तुमच्या मेलेल्या मनावर,

पोटापुरत्या ज्ञानावर,

सोईच्या न्यायबुद्धीवर,

 

एक निबंध लिहू का सर?

शेठजींच्या रग्गड पैश्यावर,

बापाच्या आंधळ्या प्रेमावर,

पाळीव कुत्र्यांच्या शेपटांवर,

 

एक निबंध लिहू का सर?

धावत आलेल्या दलालांवर,

कोठडीतल्या पिझ्झा डिलिव्हरीवर,

बर्गरने उतरवलेल्या दारूवर,

 

एक निबंध लिहू का सर?

महागड्या गाडीच्या महत्वावर,

तुच्छ दुचाकीच्या अस्तित्वावर,

निराधारांच्या निरुपद्रवी मुडद्यांवर,

 

एक निबंध तुम्ही पण लिहा सर,

कुठल्या तरी नशेत,

तुम्ही चालवलेल्या लेखणीवर,

आणि चिरडू दिलेल्या माणुसकीवर !

(पुणे पोर्श कार अपघात, निरपराध बळी, पोलीस आणि न्यायाधीशांची भूमिका आणि तातडीचा  जामीन प्रकरणावर सुचलेली कविता ! ) 

कवी : ॲड.मंजित राऊत

9890949569

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “भैरूची गोष्ट…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ “भैरूची गोष्ट…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

पहाट झाली. भैरू उठला.

बैल सोडले. औत जोडले.

शेतात गेला. शेत नांगरले.

दुपार झाली. औत सोडले.

बैलांना वैरण घातली. जवळ ओढा होता. बैलांना पाणी पाजले. आपली भाकरी सोडली.

चटणी, भाकरी, कैरीचे लोणचे.

झाडाखाली बसला. आवडीने जेवला.

पन्नासेक वर्षांपूर्वी शाळेच्या पाठ्यपुस्तकातून भेटणारा हा जुना भैरू. काळाच्या ओघात तो भेटेनासा झाला. त्याची जागा आता नव्या भैरूनं घेतली. हा भैरूही त्या भैरू सारखाच पहाटे उठतो…

पहाट झाली. भैरू उठला…

नाईटलॅम्पच्या अंधुक उजेडात उशापाशी ठेवलेला चष्मा त्याने चाचपडत शोधला आणि मोबाईल हातात घेतला – ‘गुड मॉर्निंग … सुप्रभात’चे मेसेजेस पाठवायला. कॅलेंडरकडे नजर टाकून त्याने वार बघितला. आज शनिवार, म्हणजे ‘जय हनुमान, जय बजरंगबली’चे मेसेजेस टाकायला हवेत, भैरूच्या मनात आलं. शाळा-कॉलेजमधल्या मित्रांचे ग्रुप्स, सोसायटीचा ग्रुप, बँकेतल्या रिटायर्ड मंडळींचा ग्रुप, नातेवाईकांचे ग्रुप्स, सगळीकडे ‘गुड मॉर्निंग…सुप्रभात’चे मेसेजेस टाकल्यावर एक काम हातावेगळं केल्याचं समाधान भैरूला वाटलं. ‘आता या सगळ्यांची मॉर्निंग गुड जावो की बॅड, आपल्याला काय त्याचं’ या भावनेनं तो पुन्हा बेडवर आडवा झाला. आता तास-दीड तासाने उठल्यावर तो पुढच्या कामाला लागणार होता.

चहा-नाश्ता संपवून भैरूनं मोबाईल पुन्हा हातात घेतला. या ग्रुपमधले मेसेजेस त्या ग्रुपमध्ये टाकायचं काम आता त्याला करायचं होतं. इकडची ‘बाबाजींची प्रवचनं’ तिकडे, तिकडचं ‘रोज सकाळी एक गाणे’ इकडे, अमुक ग्रुप मधलं ‘दिनविशेष’ तमुक ग्रुप मध्ये, तमुक ग्रुपमधल्या ‘हेल्थ टिप्स’ अमुक ग्रुपमध्ये… एक तासानंतर इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे करून झाल्यावर एक मोठं काम झाल्याचा सुस्कारा भैरूनं सोडला. ‘हे सगळं आपण स्वतः वाचत बसत नाही हे किती बरंय’, आंघोळीला जाताजाता भैरुच्या मनात आलं.

आंघोळ, त्यानंतर देवपूजा घाईघाईनं उरकून त्याहूनही अधिक घाईघाईनं भैरूनं पुन्हा मोबाईल हातात घेतला. बँकेच्या ग्रुपमध्ये कुणाचातरी वाढदिवस होता. या बर्थडे बॉयशी आपली तोंडओळखही नाही, भैरुच्या लक्षात आलं आणि पाठोपाठ ‘आपण विश केलं नाही तर बरं दिसणार नाही. लोक काय म्हणतील?’ असं मनात आलं. लगोलग त्यानं त्याच्या स्टॉकमधल्या केकचा फोटो टाकून त्याला शुभेच्छा दिल्या आणि पाठोपाठ दुसऱ्या एका ग्रुपमध्ये कुणीतरी गचकल्याच्या पोस्टवर RIP लिहून गेलेल्याच्या आत्म्याला शांतीही मिळवून दिली. मोबाईल खाली ठेवायच्या आधी भैरूनं सकाळपासून आलेल्या सगळ्या गाण्यांना, अभंगांना ‘वा छान’, ‘मस्तच’ अशी दाद देऊन टाकली आणि मग ती गाणी, ते अभंग डिलीटही करून टाकले. ‘दाद देण्यासाठी हे सगळं ऐकलंच पाहिजे, असं अजिबात नाही,’असं भैरूचं मत होतं.

कुणाची वामकुक्षी संपलेली असो वा नसो, आपण आपलं काम उरकून मोकळं व्हावं, या भावनेनं दुपारी दोनच्या सुमारासच भैरूनं झाडून साऱ्या ग्रुप्सना, व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट्सना चहा-बिस्किटांचे फोटो असलेले ‘गुड आफ्टरनून’चे मेसेजेस टाकून दिले. मग सोसायटीच्या ग्रुपमध्ये एका मेंबरने ‘सोसायटीची रिडेव्हलपमेंट लवकरात लवकर करावी’ अशी पोस्ट टाकली होती त्याला सहमतीचा अंगठा दाखवला आणि त्याच्याच खाली चार पोस्ट नंतर आलेल्या, ‘रिडेव्हलपमेंटची तूर्तास गरज नाही’ या पोस्टलाही पाठिंबा दर्शवणारा अंगठा दाखवला. ‘सर्व-पोस्ट-समभाव’ आपल्या अंगी आहे, याचा अभिमान भैरूला पुन्हा एकदा वाटला. भैरूनं मग काही ग्रुप्समध्ये ‘युती’च्या बाजूने आलेली पोस्ट फॉरवर्ड केली तर काही ग्रुप्समध्ये ‘आघाडी’च्या बाजूनं आलेली. ‘कुणी का येईना सत्तेवर, आपलं काम पोस्ट्स फॉरवर्ड करायचं,’ भैरुच्या मनात आलं.

‘डॉलरच्या तुलनेत रुपया’ या सकाळीच फॉरवर्ड केलेल्या पोस्टवर एका ग्रुपमध्ये दोन-चार जणांनी शंका उपस्थित केल्या होत्या तर दुसऱ्या एका ग्रुपमध्ये एक-दोन जणांनी प्रतिप्रश्न केले होते. ‘आपल्याला यातलं XX काही समजत नाही,’  हे पक्कं माहीत असल्याने पुढचे दोन दिवस या दोन्ही ग्रुप्सवर फिरकायचं नाही अशी खूणगाठ बांधत भैरू एका तिसऱ्याच ग्रुपकडे वळला तर तिथे त्यानं फॉरवर्ड केलेल्या ‘ऐका मालकंसची गाणी’वर हा ‘मालकंस नाही, कलावती आहे’ अशी टिप्पणी कुणीतरी केली होती. त्यावर शेक्सपिअरच्या थाटात ‘नांवात काय आहे?’असं उत्तर देऊन भैरूनं विषय संपवला.

“काय मागवू रे तुझ्यासाठी – पिझ्झा की बर्गर?” या सौ च्या प्रश्नाला, “दोन्ही” असं थोडक्यात उत्तर देऊन भैरू ‘जंकफूड – एक शाप’ ही पोस्ट फॉरवर्ड करण्यात बिझी झाला.

रात्रीचे नऊ वाजल्याचे बघून भैरूनं त्याच्या पोतडीतून चंद्र-चांदण्यांची चित्र असलेले ‘गुड नाईट – शुभरात्री’चे मेसेजेस बाहेर काढले, पाठवलेही. आता मोबाईल बंद करणार तोच त्याच्या शाळासोबत्यानं पाठवलेलं ‘मालवून टाक दीप….’ गाणं त्याच्या व्हॉट्सअपवर दिसू लागलं. ‘मालवून टाक दीप….’ चे पुढचे शब्द ‘चेतवून अंग-अंग! राजसा किती दिसांत लाभला निवांत संग!’ हे आहेत, हे ध्यानीमनीही नसलेल्या भैरूनं ते ‘गुड नाईट… स्वीट ड्रीम्स’ अशी जोड देत शेजारच्या आजोबांना तत्परतेनं फॉरवर्ड केलं आणि मोबाईल बंद करून तो झोपायच्या तयारीला लागला.

उद्या पहाटे त्याला उठायचं होतं.उद्या रविवार म्हणजे सूर्याचे फोटो असलेले गुड मॉर्निंगचे मेसेजेस पाठवायचे होते… मग प्रवचनं, गाणी… इकडचं तिकडे अन् तिकडचं इकडे.

तो भैरू पहाटे उठून कष्ट करून शेतमळा फुलवत असे. हा भैरू पहाटे उठून बिनकष्टाचा वायफळाचा मळा फुलवतो.

——————

लिहिलेलं बायकोला वाचून दाखवल्यावर, “मी ओळखते बरं का या भैरूला,” असं ती आपल्याकडे बघत डोळे मिचकावत मिश्किलपणे का म्हणाली हे न उमगल्यानं बुचकळ्यात पडलेला मी.

कवी :अज्ञात

संग्राहक  : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “काकतालीय न्याय…” – लेखक : श्री उमेश करंबेळकर ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “काकतालीय न्याय…” – लेखक : श्री उमेश करंबेळकर ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

केवळ योगायोगाने म्हणजे यदृच्छेने एखादी गोष्ट घडते, तेव्हा कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक गाठ पडली, असे म्हटले जाते. कावळ्याच्या भाराने फांदी तुटत नाही, केवळ योगायोगाने तसे घडलेले असते. त्यावरूनच तो वाक्प्रचार रूढ झाला. संस्कृतमध्ये त्याला काकतालीय न्याय असे म्हणतात.

काक म्हणजे कावळा, तर ताल म्हणजे ताड वृक्ष. ताल याचा फांदी असा अर्थ शब्दकोशात नाही. त्यामुळे काकतालीय न्यायाचा योग्य अर्थ कावळा बसायला आणि ताल वृक्ष कोसळायला एक वेळ येणे असा म्हणायला हवा. मात्र मराठीत ताडाऐवजी फांदी असा शब्दभेद झाला.

ताल या संस्कृत शब्दाचे टाळी, तळहात, तसेच ताल (ठेका) असेही अर्थ कोशात दिले आहेत. त्यामुळे काकतालीय न्यायाचा, टाळी वाजवावी आणि त्यात कावळा सापडावा असाही अर्थ होऊ शकतो. तशा अर्थाचा वापर ज्ञानेश्वरांनी केला आहे. ज्ञानेश्वरीतील सतराव्या अध्यायातील

‘विपाये घुणाक्षर पडे । टाळियां काऊळा सापडे ।

तैसा तामसा पर्व जोडे । तीर्थ देशी ॥१७.३०१’

ह्या ओवीत तो आढळतो.

त्या ओवीचा अर्थ मामासाहेब दांडेकर असा देतात, की ‘घुणा नावाच्या किड्याकडून लाकूड कोरताना नकळत अक्षरे कोरली जावीत अथवा टाळी वाजवताना तीमध्ये जसा क्वचित कावळा सापडावा, त्याप्रमाणे तमोगुण्याला पुण्यस्थळी पर्वकाळाची संधी क्वचित प्राप्त व्हावी.’

ती ओवी तामस दानासंदर्भात आहे. ओवीच्या पहिल्या आणि दुसऱ्या चरणात घुणाक्षर आणि काकतालीय असे दोन्ही एकाच अर्थाचे न्याय दृष्टांत म्हणून दिले आहेत. दोन्हींचा अर्थ यदृच्छेने म्हणजेच योगायोगाने एखादी गोष्ट घडणे असा आहे. पैकी घुणाक्षर न्यायाचा उल्लेख स्पष्ट आहे, तर दुसरा ज्ञानेश्वरांनी वेगळ्या अर्थाने वापरलेला काकतालीय न्यायच आहे. ज्ञानेश्वरांनी हा वेगळा अर्थ योजण्यामागे त्यांचा काहीतरी हेतू असावा असे मला वाटते. ज्ञानेश्वरांनी केलेली योजना अधिक अर्थपूर्ण आहे. ताल म्हणजे ठेका. संगीतात सुरांइतकेच तालालाही महत्त्व असते. आरतीसारख्या गायनातदेखील टाळी वाजवून ठेका धरला जातो. लेखन आणि संगीत ही दोन मानवाची अनन्यसाधारण वैशिष्ट्ये आहेत. मानवाशिवाय इतर कोणताही प्राणी लेखन आणि संगीत निर्माण करू शकत नाही. त्या ओवीत तामसदानाचे वर्णन आहे. दान हादेखील मानवी गुणधर्म आहे. त्यामुळे त्यासंबंधीचे दृष्टांतदेखील मानवी जीवनाशी संबंधित असले पाहिजेत. कावळा बसला आणि फांदी तुटली काय किंवा ताड वृक्ष कोसळला काय, माणसाच्या जीवनात काय फरक पडतो? त्या उलट सहज टाळी वाजवावी आणि त्यात कावळ्यासारखा चाणाक्ष पक्षी सापडावा, ही माणसाच्या दृष्टीने योगायोगाने घडणारी गोष्ट ठरते. म्हणूनच, काकतालीय न्यायाचा ज्ञानदेवांचा अर्थ हा अधिक सूचक वाटतो. ज्ञानदेवांची अलौकिक प्रतिभा अशीच ठायी ठायी दिसून येते.

लेखक:श्री.उमेश करंबेळकर

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘चहा की कॉफी…’ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘चहा की कॉफी…’☕ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

जो जे वांछील तो ते पिओ!

 

चहा म्हणजे उत्साह..

कॉफी म्हणजे स्टाईल..!

 

चहा म्हणजे मैत्री..

कॉफी म्हणजे प्रेम..!

 

चहा एकदम झटपट..

कॉफी अक्षरशः निवांत..!

 

चहा म्हणजे झकास..

कॉफी म्हणजे वाह मस्त..!

 

चहा म्हणजे कथा संग्रह..

कॉफी म्हणजे कादंबरी..!

 

चहा नेहमी मंद दुपारनंतर..

कॉफी एक धुंद संध्याकाळी.!

 

चहा चिंब भिजल्यावर..

कॉफी ढग दाटुन आल्यावर.!

 

चहा = discussion..

कॉफी = conversation..!

 

चहा = living room..

कॉफी = waiting room..!

 

चहा म्हणजे उस्फूर्तता..

कॉफी म्हणजे उत्कटता..!

 

चहा = धडपडीचे दिवस..

कॉफी = धडधडीचे दिवस..!

 

चहा वर्तमानात दमल्यावर..

कॉफी भूतकाळात रमल्यावर..!

 

चहा पिताना भविष्य रंगवायचे…!

कॉफी पिताना स्वप्नं रंगवायची….!

 

कवी :अज्ञात

प्रस्तुती : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सात प्रकारच्या विश्रांती – लेखिका : डॉ. मानसी पाटील ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सात प्रकारच्या विश्रांती – लेखिका : डॉ. मानसी पाटील ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

दिवसभर खूप दगदगीचे काम करून थकून आपली सगळी एनर्जी संपलेली असते. थकवा घालवण्यासाठी आपण छान झोप घेतो. मस्त झोपून उठल्यानंतर जरा फ्रेश वाटतं , बरोबर ना ?

झोप आणि आराम यात नेमका फरक काय असतो ? आपण मस्त झोप पूर्ण केल्यानंतर आपल्याला एकदम फ्रेश वाटायला लागतं, आपल्यामध्ये एनर्जी येते. झोप पूर्ण करणे म्हणजेच आपल्याला गरज असलेल्या विश्रांतीची पूर्तता करणे नक्कीच नाही. आपण जीवनात विश्रांतीचे महत्व जाणून घेत नाही. त्यामुळे आपल्यामध्ये कायम विश्रांतीची कमतरता भासते. आपल्या जीवनात या विश्रांती सम प्रमाणात असणं अत्यंत महत्त्वाचे आहे. शरीराला आणि मनाला आवश्यक असे विश्रांतीचे सात प्रकार असतात. ते आपण सविस्तरपणे पाहूयात.

शारीरिक विश्रांती

आपण झोपतो किंवा थोडा वेळ पडून एक डुलकी काढतो, त्याला सक्रिय विश्रांती असे म्हटले जाते . यासोबतच निष्क्रिय विश्रांती पण असते, जी आपल्या निरोगी आरोग्यासाठी मदत करत असते. योग , स्ट्रेचिंग , मसाज केल्याने निष्क्रिय विश्रांती मिळत असते.

मानसिक विश्रांती

दिवसभर दगदग करून आपण काहीसे चिडचिडे आणि विसरभोळे व्हायला सुरुवात होते. रात्री दमून थकून आपण झोपायला जातो, तेव्हापण आपल्या डोक्यात दिवसभर जे काही झालं, तेच सुरू असतं. रात्री झोपताना देखील आपण आपले विचार बाजूला ठेवून झोपू शकत नाही.

आठ तास झोपून पण आपल्याला झोप पूर्ण झाली नाही, असे वाटत राहतं. बिछान्यावर पडून राहण्याची इच्छा होते. हे आपल्यासोबत कशामुळे होत असेल, याचा विचार कधी आपण केला आहे का ?

मानसिक विश्रांतीचा अभाव हे याचे मुख्य कारण आहे. आता या त्रासातून स्वतःला कसे सोडवायचे ? आपली नोकरी किंवा काम सोडून देणं, हा मार्ग तर आपण अवलंबू शकत नाही. त्यामुळे आपल्या कामाचे एकूण किती तास आहेत, ते पहिले बघा. त्यांचे दोन दोन तासात विभाजन करा. आता प्रत्येक दोन तासांमध्ये एक दहा मिनिटांचा ब्रेक घ्या. आणि हा ब्रेक आपण कधी घेणार आहोत, याचं नियोजन करा . आपल्याला सुट्टी घेण्याचीही बऱ्याचदा गरज असते. त्यामुळे आपण सुट्टी घेणं आवश्यक आहे.  रात्री झोपताना जवळ एक डायरी घेऊन झोपा आणि ज्या विचारांमुळे झोप येत नाही किंवा घाबरायला होतं, अशा विचारांची नोंद ठेवा. जेणेकरून त्यावर मात कशी करू शकू, यावर आपण अभ्यास करू शकतो.

सेन्सरी विश्रांती

विश्रांतीचा तिसरा प्रकार आहे , सेन्सरी विश्रांती. दिवसभर सतत लॅपटॉप, कॉम्प्युटर यांच्यासमोर बसून काम करणे,  लाईट्स , आजूबाजूला होणारा आवाज , खूप लोकांशी कामासाठी बोलत राहणे , यामुळे आपल्या संवेदनांवर खूप लोड निर्माण होतो. आता तुम्ही म्हणाल, ऑफिसमध्येच फक्त काम केल्याने हे होते का ? कारण सध्या बरेच लोक घरून काम करत आहेत. पण ऑनलाइन मिटींग करूनही आपण या त्रासाला सामोरे जात असतो. यासाठी काम करत असताना काही वेळ, अगदी एक मिनिट तरी शांत डोळे मिटून बसणं फायदेशीर ठरेल. आपले काम पूर्ण संपल्यानंतर झोपण्यापूर्वी स्वतःला इलेक्ट्रॉनिकस् माध्यमातून अनप्लग करून झोपण्यास सुरुवात करा.

क्रिएटीव्ह विश्रांती

क्रिएटीव्ह विश्रांतीचे महत्व सातही विश्रांतीमध्ये सगळ्यात जास्त आहे. अशा प्रकारच्या विश्रांतीमुळे आपल्याला नवीन कल्पना सुचण्यास मदत होते. आपण आपल्याला आवडणाऱ्या एखाद्या शांत रम्य जागी शेवटचं कधी गेला होतात आणि तिथे निवांत कधी बसला होता ते आठवा. बाहेर असणाऱ्या निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवल्यानंतर आपल्याला क्रिएटीव्ह विश्रांती मिळत असते. आता फक्त निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणं म्हणजेच क्रिएटीव्ह विश्रांती नव्हे. तर काम सोडून ज्या गोष्टी , छंद, कला आपल्याला आवडतात ते करणे म्हणजे क्रिएटीव्ह विश्रांतीच . अशा गोष्टी, जिथे आपण व्यक्त होत आहोत असे वाटते , अशा गोष्टी , छंद जोपासण्यासाठी वेळ देणं याचा समावेश क्रिएटीव्ह विश्रांतीमध्ये होत असतो. आपण आपले आठवड्यातील चाळीस तास तर गोंधळून विचार करण्यात घालवत असतो. त्यामुळे आपल्याकडून क्रिएटीव्ह काही होत नसल्याचे पाहायला मिळते.

भावनिक विश्रांती

सतत इतरांना काय वाटेल, यांच्या चिंतेत असण्याने भावनिक विश्रांतीची गरज वाढते. कुटुंबातील व्यक्ती, मित्र, सहकारी आणि बॉसेस यांच्या लेखी योग्य असे वागण्यात प्रचंड ऊर्जा खर्च होते.

अशा वेळेस जो आपल्याबद्दल काहीही मत बनवणार नाही, ज्याच्याशी आपण कोणत्याही विषयावर काहीही बोलू शकतो अशा मित्रांना भेटा/फोन करा. तेव्हाच आपल्याला ‘भावनिक विश्रांती’  मिळेल. आपल्या मनातील गोष्टी बोलता येणं आणि ते ऐकणारा माणूस असणं हे परमभाग्याचं लक्षण आहे. 

सामाजिक विश्रांती

भावनिक विश्रांती नंतर आता सामाजिक विश्रांती काय असते ते पाहूयात.

गेल्या काही वर्षात सोशल मीडियाच्या अति वापरामुळे नकारात्मकता प्रचंड वाढली आहे. आपल्या आसपास असणारी माणसे आपण बदलू तर शकत नाही. मात्र जास्तीत जास्त प्रेरणा देणाऱ्या, उत्साह वाढविणाऱ्या, सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सामाजिक विश्रांती. ज्यांच्याशी दोन मिनिटे बोलल्यानंतर लगेचच उत्साह दुणावतो, अशा लोकांसोबत संपर्कात राहा.

आध्यात्मिक विश्रांती

या विश्रांतीनंतर आध्यात्मिक विश्रांती समजून घेऊया. प्रेम , आपुलकी , स्वीकार करणे या भावना अगदी शारीरिक व मानसिकतेच्या पलीकडे जाऊन खोलवर समजून घेणं, ही आध्यात्मिक विश्रांती.  आता ही विश्रांती आत्मसात करण्यासाठी स्वतःपेक्षा इतरांना उपयोग होईल, अशा कामांत स्वतःला गुंतवा , रोजच्या रोज प्रार्थना, ध्यान करा, तसेच आपल्या आवडीच्या सामाजिक कार्यासोबत  जोडले जा.

मित्रहो, लक्षात आलं ना? फक्त झोप पूर्ण करून आपण बाकीच्या विश्रांतीच्या गरजा पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे आता स्वतःसाठी आवश्यक असणाऱ्या विश्रांतीवर लक्ष केंद्रित करा. शारीरिक आणि मानसिक दोन्हीही दृष्ट्या सुदृढ व्हा !‌

लेखिका :डॉ. मानसी पाटील

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares