मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मी देव पहिला” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “मी देव पहिला” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

एका भयाण रात्री मंदिराच्या पायरीवर लाईटच्या उजेडात एक साधारण पंधरा वर्षाचा एक मुलगा अभ्यास करताना पाहिला.

थंडीचे दिवस होते. कुडकुडत होता पण वाचनात मग्न होता.

 

हप्त्यातून दोनदा त्या रस्त्याने मी जात असायचॊ.

दिवसा कधी दिसत नसायचा.

खुप जिज्ञासा होती त्या मुलां बद्दल जाणण्याची.

एक दिवस रात्री उशिरा जेवण करून मी त्या रस्त्याने गाडी घेऊन निघालो होतो.

मनात आलं तो मुलगा जर तिथे असेल तर त्याच्या साठी काहीतरी पार्सल घेऊन जाऊ.

 

रात्रीचे साडेबारा वाजले असतील.

मी त्या मंदिराकडे आलो.

तर तो मुलगा नेहमी प्रमाणे मंदिराच्या पायरीवर अभ्यास करत दिसला.

मी गाडी थांबवली. त्याच्या जवळ गेलो.

मला बघून तो गालातल्या गालात हसला.

जणू माझी त्याची जुनी ओळख असावी.

मी म्हणालो बाळ तू रोज इथे बसून का अभ्यास करतोस? 

सर माझ्या घरात लाईट नाही.

माझी आई आजारी असते.

दिव्यात रॉकेल घालून अभ्यास करायला. माझी ऐपत नाही.

बाळ तू मला बघून का गोड हसलास ? 

सर तुम्ही देव आहात !

नाही रे! 

सर तुम्ही माझ्या साठी देवच आहात.

ते जाऊदे तू जेवलास का? 

मी तुझ्यासाठी खाऊचं पार्सल आणलं आहे.

सर म्हणूनच मी हसलो.

मला माहित होतं.

तो (देव) कोणत्याही रूपात येइल पण मला भुकेलेला नाही ठेवणार.

मी जेंव्हा जेंव्हा भुकेलेला असतो, तो काहींना काही मला देतोच.

कधी नवसाचे पेढे तर कधी फळ तो मला देऊन जातो.

आज मी भुकेलेला होतो पण निश्चिंत होतो.

मला माहित होतं…. तो काहीतरी कारण करून मला भेटायला येणार आणि तुम्ही आलात.

तुम्ही देव आहात ना !

मी निःशब्द झालो, नकळत माझ्या कडून पुण्याचं काम घडलं होतं.

रोज कर्जाच्या ओझ्याखाली दबताना देवाला कोसत होतो. त्याने आज मला देवाची उपाधी देऊन लाजवलं होतं.

त्याने तो अर्धवट खाऊ खाल्ला आणि म्हणाला, सर तुम्ही इथेच थांबा. मी अर्धं माझ्या आईला देऊन येतो.

माझे डोळे तरळले.

त्याला काही विचारण्या अगोदरच त्याने सारं काही कृतीतून सांगितलं होतं.

तो पाच मिनिटांनी परत आला.

त्याच्या ओंजळीत पारिजातकाची फुलं होती.

सर,

माझी आई सांगते, ज्या परमेश्वराने आपल्या पोटाची खळगी भरली त्याच्या चरणी ओंजळभर फुलं तरी वहावीत.

क्षणभर डोळे बंद केले आणि त्या बंद दारातल्या पाषाणाकडे पाहिलं, तर तेही मला त्या मुलाच्या गोड हसण्यासारखं वाटलं.

नंतर कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊन झालं.

शाळा, कॉलेज, मंदिर बंद झाले.

देवळं ओस पडली. देवळांना कुलूप ठोकली आणि रस्त्यावर शुकशुकाट झाला.

असच एके दिवशी त्या मुलाची आठवण झाली आणि मुद्दाम त्या देवळाकडे डोकावलं.

रात्रीची वेळ होती.

देवळाची पायरीवरील लाईट बंद होती आणि तो मुलगा कुठेच दिसला नाही.

वाईट वाटलं मला.

या महामारीत कुठे गेला असेल हा मुलगा ?

काय खात असेल ?

कसा जगत असेल ?

असे ना ना प्रश्न आ वासून उभे राहिले.

कोरोनाच्या महामारीत असंख्य लोकांनी प्राण गमावले.

असाच आमचा एक मित्र पॉजिटीव्ह होऊन दगावला.

मी त्याच्या अंत्य संस्काराला स्मशानात गेलो होतो. अंत्यसत्कार झाले.

सर्व आपल्या घरी निघाले.

निघताना हात पाय धुवावे म्हणून शंकराच्या मंदिरा शेजारील नळावर गेलो.

पाहतो तर तो मुलगा नळावर स्मशानात टाकलेले प्रेतावरचे सफेद कपडे धुऊन त्या स्मशानाच्या भिंतीवर वाळत टाकत होता.

मला बघून त्याने आवाज दिला,

सर….

अरे तू इथे काय करतोस ? 

सर आता मी इथेच राहतो.

आम्ही घर बदललं.

भाडं भरायला पैसे नव्हते.

त्यातच लॉकडाऊन मध्ये शिव मंदिर बंद झालं आणि पायरी वरची लाईटही बंद झाली.

मग मला घेऊन आई इथे आली.

काही झालं तरी शिक्षण थांबता कामा नये असं तिनं सांगितलं आहे.

त्या शिव मंदिराचे दरवाजे बंद झाले पण ह्या शव मंदिराचे दरवाजे कधी बंद होत नाहीत.

तिथे जीवंत माणसं यायची आणि इथे मेलेली.

ह्या लाईट खाली माझा अभ्यास चालू असतो.

 

सर मी हार नाही मानली.

आई सांगायची……..

ज्याने जन्म दिला तोच भुकेची खळगी भरणार.

 

बरं… तुझी आई कुठे आहे ? 

सर ती कोरोनाच्या आजारात गेली.

तीन दिवस ताप खोकला होता.

नंतर दम अडकला.

मी कुठे गेलो नाही.

इथे पडलेल्या तुटक्या, अर्ध जळलेल्या लाकडांनी तिला अग्नी दिला.

१४ दिवस इथंच ह्या खोपीत होम क्वाँरनटाईन राहिलो.

सरकारी कायदा मोडू नकोस, तो आपल्या भल्यासाठी असतो, असं ती सांगायची.

आईच्या अस्थी समोरच्या नदीत विसर्जित केल्या आणि काल इथल्या स्मशानातल्या अग्नी देणाऱ्यांना जेऊ घातलं आणि आईच क्रियाकर्म आटपलं.

 

सर तरी मी हरलेलो नाही पण दुःख एव्हढच आहे की मी पास झालेलो पहायला आई ह्या जगात नाही.

ती जिथे ज्या जगात असेल तिथे खुप खुश असेल हे माझं यश बघून.

कालच माझा रिजल्ट लागला आणि मी शाळेत पहिला आलोय.

आता पुढच्या शिक्षणाचा खर्च माझे शिक्षक करणार आहेत पण आता तर खरी अडचण उभी राहिलीय.

ऑनलाईन अभ्यास करायला माझ्या जवळ मोबाईल सुद्धा नाही.

 

असो 

सर,

तुम्ही का वाईट वाटून घेता ? 

तुम्हाला मी पास झाल्याचा आनंद नाही झाला ? 

सर,

तुम्ही कुठे जाऊ नकात, इथेच थांबा.

 

त्याने छोट्याशा डब्यातून साखर आणली होती.

चिमूटभर माझ्या हातावर ठेवली.

सर तोंड गोड करा.

 

तो डबा ठेवायला त्या खोपीत गेला तोवर मी माझ्या तोंडावर त्या नळाचं पाणी मारून भानावर आलो.

भरलेले डोळे लपवण्यासाठी तोंड धुतले.

 

सर,

मला माहीत होते, देव या जगात आहे आणि तो माझ्या आनंदात माझी पाठ थोपटायला नक्की येणार.

त्याने पुढे काही बोलण्या अगोदरच मी नुकताच घेतलेला माझ्या खिशातला माझा नवा मोबाईल त्या मुलाच्या हातावर टेकवला आणि त्याची पाठ थोपटून निमूटपणे बाय करून स्मशानाबाहेर चालू लागलो.

आता दर महिन्याला मी त्याचा मोबाईल रिचार्ज करतो…

न सांगता.

 

खरा देव तर कधीच नाही दिसला पण,

मी त्या मुलाच्या डोळ्यात देव पाहिला…

मी देव पाहिला…


लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित 

(हे कोणी लिहिलं आहे हे माहीत नाही पण हे वाचल्यानंतर माझ्यासुद्धा डोळ्यात पाणी आलं. म्हणून मी शेअर करतोय… कारण मलाही कळले माणसातच देव आहे.)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘तो…’ –  कवी – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

 

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘तो…’ –  कवी – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

जन्माला आला तो

वंशाचा दिवा झाला 

पहिल्याच दिवशी त्याला

जबाबदारीचा शिक्का लागला 

*

थोडा मोठा झाला तो

भावंडांचा भाऊ झाला 

आपल्या खेळण्यातला

अर्धा हिस्सा वाटू लागला 

*

वयात आला तो

बहिणीचा रक्षक झाला 

रक्षाबंधनाला तर

स्वतःची मनिबॅंक ही फोडू लागला 

*

कॉलेजला गेला तो

मैत्रिणींचा मित्र झाला 

तिच्या सुख दुःखाचा

आपसूक वाटेकरी बनला 

*

लग्नामध्ये त्याच्या तो

नवरदेव झाला 

बोहल्यावरच्या रुबाबतही

जबाबदारीचा पुतळा ठरला 

*

लग्नानंतर मात्र तो

दोन भूमिकेत आला 

बायकोचा नवरा की

आईचा मुलगा यात अडकला 

*

आई बापाच्या उतारवयात

त्यांच्या काठीचा आधार झाला 

स्वतः साठी कमी अन

घरासाठी जास्त जगू लागला 

*

बाळाच्या चाहुलीने तो

बाप झाला 

छकुलीच्या हास्यासाठी

रात्रंदिवस झटू लागला 

*

छकुलीच्या लग्नामध्ये तो

वरबाप झाला 

सगळ्यांच्या आनंदासाठी

आपले अश्रू लपवू लागला 

*

नातवंडांच्या मेळ्यामध्ये तो

आजोबा झाला 

दुधापेक्षा साईला

तळहाताच्या फोडासारखा जपू लागला 

*

आत्ता कुठे त्याला

थोडा निवांतपणा मिळाला 

जोडीदाराचा हात त्याने

खूप घट्ट पकडला 

*

तो पर्यंत त्याच्या

पिंजऱ्यातील पिल्ले उडून गेली 

बायकोची आणि त्याची

हाडेही आता थकून गेली 

*

मनात असतानाही तो

मनाप्रमाणे जगला नाही 

ठाम मते असतानाही

मत आपले मांडले नाही 

*

आज देवाकडे तो

साथ फक्त मागतो आहे 

बायकोच्या आधी ने मला

देवाला म्हणतो आहे 

*

आजपर्यंत आयुष्यभर तो

घरासाठी झटला आहे 

स्मशानात जाताना मात्र

रित्या ओंजळीने जातो आहे 

*

ओंजळ रिकामी असली तरी

मन त्याचे भरले आहे 

अंत्यविधीची गर्दी पाहून

माणुसकीचे फळ मिळाले आहे 

*

जाता जाता सगळ्यांना

एकच तो सांगतो आहे 

– – पैशापेक्षा माणसांना किंमत द्या म्हणतो आहे.

लेखक : अज्ञात 

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “देवा तुझी किमया अगाध आहे…!” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ “देवा तुझी किमया अगाध आहे…!” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

(नशीब कसं वळण घेते)

ती फिरायला गेली असताना तिला एक जुन्या पध्दतीचं व ठसठशीत असं कानातलं सापडले.

सोन्याचं वाटलं म्हणून खात्री करून घेण्यासाठी ती सराफाकडे गेली. सराफाने बघून सांगितले की ते कानातले सोन्याचे आहे. ते घेऊन ती घरी आली.

घरी कामाची बाई सखू रडताना बघून तिने कारण विचारले. सखू म्हणाली, “वहिनी, लेकीची चार महिन्याची फी भरली नाही म्हणून तिला शाळेतून घरी पाठवलं. थोडे पैसे उसने द्या.”

ती म्हणाली, “हे बघ मला आत्ताच सोन्याचं कानातलं सापडले आहे. ते मी तुला देईन. ते विकून तू सगळ्या वर्षाची फी भरू शकतेस.”

सखू म्हणाली, “नको वहिनी. या महिन्याची फी द्या. पुढचं काहीतरी करून जमवेन मी. आणि त्या कानातल्याचा फोटो टाका ते फेसबुक का काय म्हणतात त्यावर. विचारा की या भागात फिरताना कुणाचं कानातलं हरवले आहे का म्हणून. कुणी कष्टाने हे बनवलं असलं आणि मी ते वापरले तर मला पाप लागेल. पै पै जमवून बायका दागिना बनवतात, तो मी कसा वापरणार?”

वहिनी म्हणाली, ”छान आहे ग आयडिया.” तिनं लगेचच कानातल्याचा फोटो व ज्या भागात ते सापडले ती माहिती फेसबुक वर लिहली.

दोन तासातच तिला मेसेज आला की हे माझं कानातलं आहे. असं दुसऱ्या कानातलं मी दाखवायला घेऊन येते.

.. ललिता कान्हेरे नावाची मध्यम वयाची बाई भल्या मोठ्या चकचकीत गाडीतून आली.

तिनं दुसरं कानातलं दाखवलं. वहिनीनं सखूला बोलावलं आणि कान्हेरे बाईंना सांगितलं, “तुम्हाला या सखूमुळे तुमचं कानातलं मिळालं बरका.” व सारी हकीकत सांगितली.

कान्हेरे बाई खूष होऊन सखू ला म्हणाली, “थॅंक्यू सखू. तुमचे दोघींचे मनापासून आभार मानते. हे माझ्या आजीचं कानातलं आहे. तिची आठवण आहे ही. कानातून पडल्यापासून चैन नव्हती मला. सगळीकडे शोधून आले. आज तुमची फेसबुक पोस्ट बघताच जीव शांत झाला. कसे तुमचे आभार मानू? बक्षिस काय देऊ तुम्हाला?”

वहिनी म्हणाली, “ललिताताई तुम्हीच त्या नव्या १२ वी पर्यंतच्या शाळेच्या संस्थापक ना? तुमचा फोटो मी बरेचदा वर्तमानपत्रात बघितला आहे!”

“हो. मीच ती ललिता कान्हेरे. आजीची ईच्छा होती शाळा काढण्याची पण तिच्या हयातीत तिला जमलं नाही. तिचं स्वप्न मी पूर्ण केलं. देवाच्या कृपेने शाळा उत्तम चालली आहे.” कान्हेरे बाई म्हणाल्या.

“बक्षिस वगैरे काही नको पण सखूच्या मुलीला कमी फी मधे तुमच्या शाळेत घ्याल का? “ वहिनी म्हणाली.

“अहो अगदी आनंदाने! Actually, मी तर म्हणेन मी तिला मोफत शिकवेन. वह्या, पुस्तकं, युनिफॅार्म सर्व काही मी बघेन. चालेल का सखुबाई?” कान्हेरे बाई म्हणाल्या.

सखूचे डोळे भरून आले. “वहिनी, माझे नशीब म्हणून मी तुमच्यासारखीकडे काम करते.”

वहिनी म्हणाली, “सखू माझं नशीब म्हणून तू मला भेटलीस. मुलीला शाळेतून घरी पाठवलं फी भरता आली नाही म्हणून, तरी तुझा विवेक ढळला नाही. ”

कान्हेरे बाई कौतुकाने हसून म्हणाल्या, “निघू मी? सखू ये उद्या लेकीला घेऊन. आज शांतपणे झोपेन बघ. Thank_you_so_much. ”

सखू चार तासात झालेल्या घडामोडी बघून थक्क झाली होती. “देवा तुझी किमया अगाध आहे…. क्षणात रडवतोस आणि क्षणात डोळे पुसतोस रे बाबा! ” असं म्हणत ती गणपतीच्या फोटोसमोर हात जोडून उभी राहिली.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आई.. आणि तिची सुखाची व्याख्या…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “आई.. आणि तिची सुखाची व्याख्या…” – लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

तसा मी खूप व्यावहारिक माणूस आहे. जाताना माझ्या आईने मला सांगितले होते.

“मिलिंद… तुला सुखी राहायचे असेल तर फक्त एकच गुण तुझ्या अंगी बाणवून घे, ‘जितक्या लवकर एखाद्याशी जोडला जाशील, तितक्याच लवकर त्याच्यापासून दूर होता आले पाहिजे’. थोडक्यात मोह धरला तर दुःखी होशील. “

ही गोष्ट मी इतकी मनाशी रुजवली आहे की जो पर्यंत कुणी माझ्या सोबत आहे, मी त्याचा असतो. ज्यावेळी तो दूर जातो, मी त्याला विसरून जातो. कुणाला हा दुर्गुण वाटू शकतो पण माझ्यासाठी तो गुण आहे. बरे ही गोष्ट माझ्या मनात इतकी घट्ट बसली आहे की अनेकदा लोकांना मी पाषाणहृदयी वाटतो. आई असताना मी कायम तिचा सारथी असायचो. तिला कुठेही जायचे तरी तिच्यासोबत मी असणारच. तिच्या आजारपणातही मी तिच्याजवळच बसलेला असायचो. त्यामुळे त्यावेळी अनेकांना प्रश्न पडला होता, आई गेल्यावर याला किती त्रास होईल? पण ती ज्या दिवशी गेली त्याच दिवसापासून माझे हसणे, विनोद करणे चालू झाले. ही गोष्ट अनेकांच्या पचनी पडली नाही. सकाळी आई जाते आणि संध्याकाळी हा हास्यविनोद करतोय? म्हणजे याचे वागणे खोटे होते की काय? हे मला त्या लोकांच्या चेहऱ्यावरही दिसून यायचे. पण माझ्यात काही फरक पडला नाही. आजही मी तसाच आहे.

हे सगळे आठवण्याचे कारण… काल खूप दिवसांनी भद्रकाली मंदिरात गेलो होतो. पायऱ्या चढताना मनात विचार आला, या पायऱ्या बोलू शकल्या असत्या तर किती छान झाले असते? माझी पणजी ( माझ्या आईची आजी ) आणि माझी आजी कायम दर्शन झाल्यावर या पायऱ्यांवर बसलेल्या असायच्या. माझ्या आईचे बालपण याच पायऱ्यांवर खेळण्यात गेले. मीही माझ्या आईला अनेकदा इथे दर्शनाला घेऊन आलेलो.

मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. नेहमीच्या ठिकाणी पादत्राणे काढली आणि देवीसमोर जाऊन उभा राहिलो. मागे कीर्तन चालू होते. ऐकायला ८/१० लोकच असतील. देवीची मूर्ती खूपच छान दिसत होती. दर्शन घेताना मला माझी आई आठवत होती त्यामुळे आपोआपच डोळे भरून आले. आई ज्याप्रमाणे देवीच्या पुढे बनवलेल्या पावलांवर डोके ठेवून दर्शन घ्यायची मीही अगदी त्याचप्रमाणे दर्शन घेतले आणि दरवाज्याजवळील आतल्या बाजूस असलेल्या चौथऱ्यावर शांत बसून राहिलो. थोड्या वेळात काही स्त्रिया दर्शनाला आल्या. त्यांचे वय साठीच्या आसपास असेल. त्या प्रत्येकीत मला माझ्या आईच्या काही गोष्टी दिसू लागल्या. काहींची वेशभूषा माझ्या आईसारखी, काहीची केशभूषा आई सारखी. काहींचे चालणे, काहींचे बोलणे आईसारखे. आणि आपोआपच माझ्या चेहऱ्यावर हसू आले. मनात म्हटले… आई काही आपल्याला सोडायला तयार नाही. हेहेहे…

काल रात्री खूप दिवसांनी आई स्वप्नात आली.

“बरे झाले… देवच पावला म्हणायचा. ” आईने म्हटले.

“कशाबद्दल?”

“वाकडी वाट करून देवीच्या दर्शनाला जाऊन आलास. एरवी कुणी सांगितले असते तर म्हणाला असतास, ‘देवीला मनातल्या मनात मनोभावे नमस्कार केला तरी पोहोचतो, त्यासाठी मंदिरातच का जायला हवे?” तिने हसत म्हटले आणि मलाही हसू आले. कारण अनेकदा तिने मला मंदिरात दर्शनाला चल म्हटल्यावर मी हेच वाक्य बोलायचो.

“हेहेहे… मी जरी मंदिरात जात नसलो तरी बाहेरून नमस्कार करतो. आणि कलियुगात हीच गोष्ट जास्त पुण्य देऊन जाते. “

“ठीक ठीक… पण मंदिरात जात जा असाच. मी तुला कायम तिथे भेटेल. कुणा ना कुणाच्या रुपात. ” तिने माझ्याकडे रोखून बघत म्हटले.

“आई… एक विचारू?”

“विचार… “

“मी, तू गेल्यावर रडलोही नाही, तू म्हटल्याप्रमाणे कोणत्या गोष्टीचा मोह ही धरला नाही तरी मंदिरात गेल्यावर तुझ्या आठवणीने माझे डोळे का डबडबले?” मी विचारले तसे आईच्या चेहऱ्यावर नेहमीचे चिरपरिचित स्मित झळकले.

“कारण तू मोह धरला नसला तरी तुझ्या हृदयात प्रेम कायम आहे. त्यामुळेच तुला समोर येणाऱ्या स्त्रीमध्ये मी दिसते. तू कायम मला शोधत असतोस आणि मीही त्यांच्या रुपात तुझ्यासमोर येते. लक्षात ठेव, ज्या ज्या वेळी तुला माझी गरज असेल, मी कायम तुझ्या जवळपास असेल. “

“अरे.. !!! मोह आणि प्रेम एकच ना?”

“नाही… मोह आणि प्रेम जरी वरकरणी एक वाटत असले तरी त्यात फरक आहे. मोहात स्वार्थ असतो, प्रेम निस्वार्थ असते. मोहात माणूस स्वतःच्या सुखाचा विचार करतो, प्रेमात दुसऱ्याच्या सुखाचा विचार करतो. मोह अल्पकालीन असतो, प्रेम कायमस्वरूपी असते. मोह बांधून ठेवतो, प्रेम कशातही अडकवत नाही. त्यामुळे याबद्दल फारसा विचार करू नकोस. जसा आहे तसाच रहा. ज्यावेळी तू मला कोणत्याही स्त्रीमध्ये बघशील, तिचा आदर करशील, तुझ्या मनात माझ्याबद्दल असलेले प्रेम टिकून राहील. ” आईने सांगितले आणि मला जाग आली. आई असताना भलेही मी स्वतःला तिचा सारथी म्हणवून घेत होतो पण माझी आईच खऱ्या अर्थाने माझी सारथी आहे. ज्यावेळी मी अर्जुनासारखा संभ्रमित होतो, ती श्रीकृष्णासारखी मला उपदेश करते. तुम्हीही ज्यावेळी संभ्रमित व्हाल, फक्त तुमच्या आईला आवाज द्या, ती कृष्ण बनून तुमच्या मदतीला हजर असेल यात शंका नाही.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘शृंगार मराठीचा’… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

📚 वाचतांना वेचलेले 📚

☆ ‘शृंगार मराठीचा’ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

अनुस्वारी शुभकुंकुम ते 

भाळी सौदामिनी |

*

प्रश्नचिन्ही डुलती झुमके 

सुंदर तव कानी |

*

नाकावरती स्वल्पविरामी

शोभे तव नथनी |

*

काना-काना गुंफुनी माला 

खुलवी तुज मानिनी |

*

_वेलांटी_चा पदर शोभे

तुझीया माथ्याला |

 

_मात्रां_चा मग सूवर्णचाफा

वेणीवर माळला |

*

_उद्गारा_चा तो गे छल्ला

लटके कमरेला |

*

_अवतरणां_च्या बटा 

मनोहर भावती चेहर्‍याला |

*

_उ_काराचे पैंजण झुमझुम

पदकमलांच्यावरी |

*

पूर्णविरामी तिलोत्तम तो 

शोभे गालावरी ॥

*

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

कवी : अज्ञात 

संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “नवं नवं बालपण…” – लेखक : श्री द्वारकानाथ सांझगिरी ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “नवं नवं बालपण…” – लेखक : श्री द्वारकानाथ सांझगिरी ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

आयुष्याला क्षणभंगुर का म्हणतात हे मला एक अख्खा दिवस मावळण्याच्या आतच कळलं होतं.

वेग, धावपळ लोकांचा घोळका, मित्रांच्या मैफिली, कौतुक, टाळ्या, हशा जाऊन त्याची जागा काळजी आणि सहानुभूतीने घेतली ते कळलच नाही. तरीही दीड वर्ष मी काहीतरी चांगले क्षण हेरत राहिलो, कधी सावधानतेच्या कड्याकुल्पातून हळूच चोरत राहीलो.

गेले दोन सव्वा दोन महिने मी स्वतःला शारीरिक कड्या कुलपात ठेवले 

कागज के फूल या गुरुदत्तच्या सिनेमात कैफी आझमीने लिहिलंय ….

“वक्त है मेहरबा आरझु है जवा

फिक्र किसी बात की करें इतनी फुरसत है कहा “

… या अशा आयुष्यात लोळायला फार बरं वाटतं. त्यावेळी असं वाटायचं वेळ मिळाला की हे वाचायचं, ते पाहायचं आहे, या विषयावर लिहायचय, अनेक संकल्प डोळ्यासमोर असायचे आज वेळ आहे संकल्पही आहेत पण काही करण्याची ती उर्मी कमी झाली. लिखाण करण म्हणजे माझ्यासाठी समाधी लागण असल्यामुळे मी अधून मधून लिहीत असतो. काही गोष्टी करताना आनंदाच् वातावरणात असणं फार महत्त्वाचं असतं.

सध्या कैफीची जागा सुरेश भटांनी घेतली. त्यांच्या कवितेचे शब्द अधून मधून कानामध्ये लाऊड स्पीकर लावल्याप्रमाणे ऐकू येत असतात.

भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले 

एवढे मी भोगले की मज हसावे लागले “

ही कविता त्यानी आपल्यासाठी लिहिली का असं वाटायला लागलं.

हळूहळू लक्षात यायला लागला की माणूस बदललेल्या परिस्थितीत आयुष्याशी जुळवून घेतो. आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो. मन नावाचा भुंगा फक्त फुल बदलतो. नसेल ते फुल पहिल्या इतक सुंदर, पण त्यातला मकरंद शोधतच राहतो 

मी कुठल्या गोष्टी बंद करायला हव्यात याची लिस्ट डॉक्टर ने दिल्यानंतर चेहरा पडण्यासाठी मला दिलीप कुमारच्या अभिनयाच्या गुणवत्तेची गरज नव्हती.. तो नैसर्गिकपणे पडला माझ्या मुलाने माझ्या चेहऱ्यावरचं नैराश्य पटकन वाचलं आणि तो एक वाक्य उच्चारला.. ते वाक्य करवतीने लाकूड कापत जाव तसं मन कापत गेल. तो म्हणाला “पब्लिक, चाहते, टाळ्या मित्र, घोळका, कौतुक यातच तुम्हाला सुख आहे का?आम्ही तुमचे कोणी नाही का?'”

आयुष्यात कधीतरी आमच्यासाठी जागा ठेवा हे तो सांगत होता आणि त्याचं काही चुकलं नाही. माणूस आजारी एकटा पडत नाही. तो कुटुंबाला घेऊन आजारी पडतो. शारीरिकदृष्ट्या तो त्रास भोगतो पण मानसिक दृष्ट्या सर्व कुटुंबच त्यात गुंतलेल असतं. आता कुटुंब पहिलं बाकी इतर सगळ्या गोष्टी नंतर असं ठरवून टाकलं.

मुलाकडे राहत असल्यामुळे आजोबा आणि नातू किंवा नात हे नातं सगळं विसरायला लावत, हे लक्षात आलं. दहा-बारा दिवसासाठी नात येऊन गेली आणि नात ( स्वरा) आणि नातू ( कियांश)यांच्याबरोबर खेळताना ते दहा-बारा दिवस किती पटकन निघून गेले हे कळलच नाही. पण त्या गोड आठवणी पहिला लेख जपून ठेवावा तशा मी जपून ठेवल्या. मी पुन्हा लहान झालो जवळपास त्यांच्याच वयाचा त्यांच्याबरोबर खेळलो, कधी पत्ते कधी लहानपणी खेळलेला व्यापारसारखा खेळ (सध्या नवा अवतार पाहायला मिळतो). जणू बालपण पुन्हा अवतरल. त्यांच्याबरोबर खेळताना आपण हरायच असतं हे मला उमगलं. आदर्श विचार केला तर हे चुकीच असेल. लहान मुलांना पराभव झाला तर तो स्वीकारायचा हे शिकवायला हवं ही गोष्ट खरी आहे. पण बऱ्याचदा आजोबाचं मन हे आदर्शवादाला जुमानत नाही. ते नात किंवा नातवाच्या चेहऱ्यावरचा आनंद पहायला आसुसलेलं असतं. बऱ्याच गोष्टीने मी घरची शिस्त बिघडवतो. नातवाच्या आई-वडिलांना वाटतं की त्याने जास्त टीव्ही किंवा मोबाईल पाहु नये आणि ते योग्यच आहे पण नातवासाठी आजोबा आणि आजी हे फार सॉफ्ट टार्गेट असते. चेहऱ्यावर अजीजीचे भाव आणून “आबा पाच मिनिटांसाठी मोबाईल दे” असं म्हटल्यावर मी पाघळतो. त्या पाचची पंधरा मिनिटे कधी होऊन जातात कळत नाही.

मला पटतं मी चुकतोय.. पण वळत नाही. माझा नातू सहा वर्षाचा आहे. त्याच्यात मी पूर्ण गुंतून गेलो. सकाळी तो शाळेत जाताना त्याने मला कॉपी दिली नाही तर तो येईपर्यंत मला चैन तू काय दिवसभर माझ्याबरोबर खेळत नाही पण त्याचा आसपासचा वावर माझ्यासाठी भरलेल्या ऑडिटोरियम इतकाच प्रिय आहे. त्यालाही मी हळूहळू मॅच्युअर होताना पाहत आहे. त्याच वाढलेलं प्रेम आणि दिवसागणीक मधासारखं गोड आणि अत्यंत घट्ट होत जाणाऱ् नातं मला सुखावत. अगदी, माझ्या कुठल्याही वैयक्तिक आनंदापेक्षा. पूर्वी आमच्या घरून मुलाच्या घरी आल्यावर परतताना तो सांगायला “आजी येताना काहीतरी घेऊन ये. एखाद टॉय आण. आणि त्याची टॉय ठरलेली असायची, कधी विमान, कधी बोट कधी, बंदूक. मुलांकडून पुन्हा दम यायचा त्याला अशा सवयी लावू नका. मध्यंतरी दहा-बारा दिवसांनी पुन्हा मुलाकडे जाताना मी सहज विचारलं, ” काय घेऊन येऊ? ‘

तो म्हणाला ” काहीही आणू नका. फक्त तुम्ही या. तुमची वाट बघतोय” माझे आणि बायकोचे डोळे पाणवले त्याच्यातला हा बदल सुखावत होताच पण मनाला एक वेगळा आनंद देऊन गेला. मध्यंतरी माझ्या व्याहांचा 70 वा वाढदिवस होता. घरातली सगळी मंडळी हॉटेलमध्ये जेवायला गेली. मी नाही जाऊ शकलो. माझ्या नातवाने आई-बाबांना भंडावून सोडलं की आबा आणि आजी का नाही आले ?आणि मला भेटल्यानंतर तो म्हणाला, “मी ती पार्टी एन्जॉय नाही करू शकलो कारण तुम्ही दोघेजण नव्हता. ” त्याची एक, दोन मिनिटांची मिठी बरंच काही सांगून जाते. त्या मिठीची उब अचानक अंगावर प्रेमाची वीज पडल्यासारखी वाटते. अंग मोहरून जात. कधीतरी तो माझ्याकडे हट्ट करतो, ” आबा क्रिकेट खेळायला चला किंवा मला बोलिंग टाका. किंवा मी सायकल चालवतोय चला ना खाली चला चला ” या क्षणी त्याच्या मागे मला पळणे शक्य नाही. मन पळायला तयार आहे पण शरीर परवानगी देत नाही. मी त्याला समजून सांगण्याचा एकदा प्रयत्न केला तेव्हा अत्यंत निरागसपणे तो मला म्हणाला, “आबा तू कधी बरा होणार?. लवकर हो. ह्या वाक्याने मनात निर्माण झालेला भावना कल्लोळ यांचे वर्णन मी नाही शब्दात करू *शकत. मी त्याला म्हणालो” अरे लवकरच बरा होईन.. मग आपण क्रिकेट खेळू. सायकल चालवू सगळं करू ” आणि मग आकाशाकडे पाहत परमेश्वराला म्हटलं “अरे माझ्यासाठी जाऊ देत नातवासाठी तरी तथास्तु म्हण. निदान हे नवं बालपण तरी मला पुन्हा नीट उपभोगून दे”

 

लेखक : श्री द्वारकानाथ संझगिरी 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘खरा प्रॉमिस डे याला म्हणतात !’ — लेखक : अज्ञात☆ प्रस्तुती – सौ. बिल्वा शुभम् अकोलकर ☆

सौ. बिल्वा शुभम् अकोलकर

?  वाचताना वेचलेले ? 

☆ ‘खरा प्रॉमिस डे याला म्हणतात ! — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. बिल्वा शुभम् अकोलकर 

प्रॉमिस डे म्हणजे

राजं तुम्ही विशाळगड गाठा एक भी गनिम पुढे सरकू देत नाही –

असं प्रॉमिस देऊन ते पाळणारे बाजीप्रभू देशपांडे

*

प्रॉमिस डे म्हणजे – 

राजं आधी लगीन कोंडाण्याचे, मगच माझ्या रायबाचं –

– असं प्रॉमिस देऊन ते पाळणारे तानाजी मालुसरे

प्रॉमिस डे म्हणजे – 

थुंकतो मी तुझ्या जहागिरीवर, माझा जीव स्वराज्यासाठीच

 – असं प्रॉमिस देऊन ते पाळणारे मुरारबाजी देशपांडे 

*

प्रॉमिस डे म्हणजे- 

आमचं राज्य घेणं तर राहूदे औरंग्या, तुझीच कबर या मातीत बांधली जाईल

 – असं प्रॉमिस देऊन ते पाळणारे संताजी धनाजी 

*

प्रॉमिस डे म्हणजे – 

राजं ६० मावळे द्या, एका रात्रीत गड घेतो –

 – असं प्रॉमिस देऊन ते पाळणारे कोंडाजी फर्जंद

*

प्रॉमिस डे म्हणजे – 

स्वराज्य स्थापन करून दाखवून आईचं स्वप्न पूर्ण केलं –

-असं प्रॉमिस देऊन ते पाळणारे छत्रपति शिवाजी महाराज

*

असा असतो खरा

प्रॉमिस डे…

ते शिकूया, तसे प्रॉमिस पाळूया !

जय भवानी, जय शिवाजी…

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ “गेले मीच उद्धरून…” – कवी : केशवानंद ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ “गेले मीच उद्धरून…” – कवी : केशवानंद ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

एके दिवशी तुकोबा 

असे तीरावरी आले..

अन् इंद्रायणीलागी थोडे 

हसून म्हणाले…

*

तुला द्यायचीच होती 

माझी गाथा परतुन..

मग पहिल्याच दिशी,

दिली का न तू आणून?

*

उगा मला तिष्ठविले असे 

तुझिया काठाला

दिस चवदा असा तू माझा

अंत का पाहिला.. ?

*

बोले इंद्रायणी मग..

तुम्ही भक्तांचे भूषण

अशा जगाच्या गुरुचा 

अंत मी कसा पाहीन.. ?

*

ऐका तुकोबा..

कधीच कोणा कळली न मात..

काय घडले सांगते 

खोल माझिया डोहात..

*

अशी गाथा त्या दिवशी 

आली डोहाच्या तळाशी..

जणू कुबेराचे धन 

आले माझिया हाताशी..

*

असा अमृताचा घट 

येता सहजी चालून..

कोणी देईल का ??

थोडी चव घेतल्या वाचून ?

*

तशी गाथा अवचित 

माझ्या हाताला लागली..

सारे विसरून जग 

मीही वाचाया घेतली..

*

पुरे चवदा दिवस केले 

तिचे पारायण

आणि मगच तुकोबा..

दिली तुम्हा परतून.. !

*

तुम्ही आभाळाएव्हढे..

अंत मी काय पाहीन..

गाथा तारी जगताला 

तिला मी काय तारीन ?

*

सारे जग शुद्ध होते..

बुडी माझ्यात घेऊन..

गाथा वाचून तुमची 

गेले मीच उद्धरून

कवी : केशवानंद

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कधीतरी स्वतःसाठी… – लेखक – श्री मंगेश विठ्ठल कोळी ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ कधीतरी स्वतःसाठी… – लेखक – श्री मंगेश विठ्ठल कोळी ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

आनंदात रहायचे असेल तर कमी बोला. इतरांच्या खोचून टोचून बोलण्याकडे दुर्लक्ष करायला शिका. दिखावा करू नका, की दुसऱ्यांना मी असा मी तसा सांगण्यात वेळ घालवू नका. तुमच्या वागण्या बोलण्यात आत्मविश्वास असायला हवा. स्वतःला आत्मसन्मान नक्कीच द्या. तुम्ही कुणासाठी नाही, पण स्वतःसाठी खुप अनमोल अमूल्य आहात. हे पक्के लक्षात घेऊन जगणे गरजेचे आहे. सतत त्याच त्याच गोष्टी उगाळत बसू नका. त्यात कोणीही इंटरेस्ट घेत नाही.. सगळे माझ्यासारखेच वागले पाहिजेत हा हट्ट सोडा. तुम्ही सर्व जगावर कार्पेट घालू शकत नाहीत. हा, पण स्वतःच्या पायात नक्की चप्पल घालू शकतात.

मेडीटेशन, अध्यात्म, व्यायाम ह्या गोष्टी तुमच्या शरीराला टॉनिक आहे त्याचा कंटाळा करू नका. प्रत्येक गोष्टीत काहीना काही भावार्थ असतो. व्यायाम तब्येत शेवटपर्यंत ठणठणीत ठेवते. अध्यात्म तुम्हाला मनावर नियंत्रण ठेवायला शिकवतो. मेडीटेशन तुमचा राग लोभ मद मोह मत्सर यावर नियंत्रण ठेवायला शिकवते.

मुलांकडून फार अपेक्षा ठेऊ नका त्यांच्या आणि आपल्या पिढीत फार मोठा फरक असतो आणि तो कधीच मॅच होणार नाही ही भावना ठेवा म्हणजे अपेक्षांचे ओझे त्यांच्या बाबतीत रहाणार नसते. काळानुसार गरजा व्यक्ती बदलत जातात. अगदी साधे उदाहरण 2000 ची नोट जी पूर्वी आपण फार जपून ठेवली आता रस्त्यात पडली तरी कोणी उचलणार नाही. कारण काळानुरूप त्याचे महत्व कमी झाले. *नाती कितीही जवळची असली तरी वेळ आली की लोक काढता पाय घेतातच. आपण रामायण महाभारत वाचतो ते दुसरे तिसरे काहीही नसून जीवनाचे तत्त्वज्ञान आहे. रामासारखा पती असून देखील सीतेला अग्नी परीक्षा द्यावी लागली. भर सभेत द्रौपदी वस्त्रहरण झाले एव्हढे सर्व समोर आपली लोक असूनदेखील द्रौपदीला वाचवायला प्रत्यक्ष नारायण ह्यांना यावे लागले. केवळ तिच्या एका चींधीने श्रीकृष्णाने तिची लाज राखली. त्यामुळे सत्ययुग, द्वापार युगातील ही एकवचनी लोक असूनदेखील असे दाखले दिसतात तर कलयुगात आपण अपेक्षा कुणासाठी आणि का ठेवायची. लोकांकडे, नको त्या आठवणी, नाते संबंध फार चर्वीचरन करत बसू नका. जास्त लक्ष न देता, आपले जगणे कसे छान होईल हे बघा.

मी माझ्या रोजच्या जीवनात खूप छान छान सकारात्मक बदल घडवून आणले आहेत का? याचा अभ्यास केला पाहिजे. तेच ते पुन्हा पुन्हा बोलणे विचार करणे माझ्याकडून होते का. आणि त्यात मी स्वतःला गुरफटून घेतले का? त्यातून माझे काढून घ्यायला, काय केले पाहिजे. हेही कळणे तितकेच महत्वाचे आहे. अहो उद्याचा दिवस आपला आहे की नाही ह्याचा भरवसा नाही. मग कशासाठी मनाला त्रास देऊन जगत रहायचे. दिलखुलास मनमोकळे जगणे, म्हणजेच आपणच आपले फुलत राहणे होय. ह्यामुळे ताणतणाव कमी होऊन, मनाची अवस्था आनंदित राहते. कधीच स्वतःला दुर्लक्षित करू नका. तुम्ही खूप महत्त्वाची व्यक्ति आहात. स्वतःला सक्षम बनवा. आदर करा स्वतःचा. कुणा दुसर्‍याची गरजच पाडणार नाही.

दुसर्‍याने तुमची स्तुती केली तरीही हुरळून जाऊ नका, आणि दुर्लक्ष, तिरस्कार केलत तरीही मनाला लावून घेऊ नका. त्यात आपल्याला आपले अनमोल आयुष्याचे अजिबात दिवस घालवायचे नाहीत, भारी जगायला आपण आपला चेहरा नेहमी हसरा ठेवा, त्यातून तुमच्या मनाचे प्रतिबिंब उठून दिसते… हसायला फार पैसे लागत नाहीत. त्यात अजिबात कंजूषी करू नका. रोज सकाळी उठून जसे जमेल तसे मस्त व्यायामाने सुरुवात करा. दिवसभर चांगली एनर्जी टिकून राहते. वेळ नाही वेळ नाही, ही नुसती पळवाट असते. वेळ मिळत नसतो. तो काढावा लागतो. उपवास शरीराला चांगला. तसेच मनाला आनंदी, फ्रेश ठेवायचे असेल तर. चांगल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. नको तो विचारांचा गुंता, त्यात अडकायचे नसते. मानस शास्त्र असे सांगते की दिवसाला तुमच्या डोक्यात 80 हजार विचार येतात. जर तुम्ही सगळेच घेऊन बसलात तर जगणे हराम होईल. आपली आण, बाण, शान आपणच आहोत हे लक्षात घेऊन जगणे सुरू ठेवले की मग फारसे काही जाणून बुजून करावेच लागत नाही, की नको ते प्रश्न फारसे डोक्यात पिंगा घालत नाहीत.

परमेश्वराची आठवण स्मरणात राहू द्या. केवळ आणि केवळ तोच तरून नेणारा आहे. फक्त आपला त्यावर विश्वास पाहिजे. देव कधीही कुणाचे चांगले किंवा वाईट करत नाही. मनुष्य आपल्या कर्मानेच चांगले वाईट दिवस आणतो. देव कुठे माझ्याकडे लक्ष देतो असे म्हणून त्याच्यावर अविश्वास दाखवू नका किंवा त्याला टाळू नका. कितीही पैसा प्रॉपर्टी आली तरी सगळे इथेच सोडून जायचे आहे ही जाणीव ठेवली की मग अहंकार आपोआप गळून पडतो. ख-या गरजवंताला नक्की मदत करा. आपण फक्त शंभर वर्षाच्या लिजवर इथे आलो अहोत हे लक्ष्यात ठेवले तर मीपणा निघून जातो, आणि आयुष्याचे सोने झाल्याशिवाय रहात नाही. दररोज परमेश्वराला प्रार्थना करा. आजपर्यँत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपाशिर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृध्दीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण आम्हास सतत होऊ देत. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कोणताही घातपात होऊ नये. याचीही काळजी तुच घे. आपल्या जिवलग व्यक्तींच्या आठवणी, आभास वास्तविकता स्वीकारून आनंदाने जगा. स्वतःची व कुटुंबाच्या जीवनाच्या आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा, पण लोकशाही व संविधान सुरक्षित ठेवा. एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यांना मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका. समाजातील खोट्या, राजकारणी, मतलबी, स्वार्थी, गर्विष्ठ, अहंकारी, लबाड, लोकांपासुन सावध व दूर रहा, अफवानवर विश्वास ठेवण्या आधी प्रथम खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा.

लेखक – श्री मंगेश विठ्ठल कोळी

प्रस्तुती – श्री अनिल वामरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “खरंच आम्ही वांझ आहोत…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ “खरंच आम्ही वांझ आहोत…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

खरंच आम्ही वांझ आहोत…

(बहुतांश उच्चशिक्षित लोकांच्या घरातील भयाण वास्तव.) 

“नमस्कर सुधाकरराव, फार दिवसांनी भेटलात.”

“होय खरे आहे, मी इथे नव्हतो. तिकडे कॅनडा ला गेलो होतो.” सुधाकरराव बोलले.

“कॅनडाला?” शंकरराव म्हणाले.

“होय दोन मुले होती. एक आहे कॅनडाला, दुसरा ऑस्ट्रेलियाला.”.. सुधाकरराव म्हणाले

”अहो. होती काय म्हणत आहात?” शंकररावांनी आ वासुन विचारले.

…”नाहीतर काय म्हणणार. आज भारतात आम्ही दोघेच आहोत.” शंकरराव बोलते झाले…” वय झालं आहे. तिचं सततचं दु:खणं असतं. दवाखान्यात न्यायला कुणी सोबत नाही. साधी दूधाची पिशवी कुणी आणायची हा प्रश्न आहे. तो शेजारचा आसाराम माझ्या पेक्षा कैक पटीने सुखी आहे. चारपाच मुलं, दोन-तीन मुली, आठ दहा नातवंडं… नुसता गोंधळ असतो. त्याचे कुणी पाय चोपत असतं, तर डोकं चोपत असतं, तर कुणी डोक्याला तेल लावतं असतं… साधा खोकला आला तर चार चार जण आसारामला उचलतात, दवाखान्यात नेतात, सलाईन लावतात. पलंगावर दोघं जण उषा पायथ्याला बसतात. दवाखान्याबाहेर आठजण बसून असतात. कुणी शिरा आणतं, कुणी सफरचंद आणतं, कुणी बिस्किटं आणतयं. आसारामच्या दिमतीला पंधरा माणसं…… आमचा मोठा बंगला, लाखभर पेन्शन, अलिशान गाडी, पण साधं गेट उघडायला कुणी नाही. गाडी चालवायला कुणी नाही. त्या आसारामच्या दारात मोडक्या तोडक्या का असेना चार पाच बाईक उभ्या असतात. कुणी भाजी आणतयं, कुणी पिण्याचं जार आणतंय, कुणी दळण आणतंय, कुणी भेटायला आलेल्या पाहुण्याला सोडायला जातंय, कुणी स्टॅन्डवरच्या पाहुण्याला आणायला जात असतंय. म्हतारी दोनचार नातवाला घेवून किराणा दुकानांवर दिवसभर चकरा मारत असते.

रात्री बारा वाजेपर्यंत यांचा आरडा ओरडा, गप्पा, हास्य कल्लोळ चालुच असतो. दहा बारा पत्र्यांचं घर आणि अंगण कस गजबजलेलं असतं… माझ्या कॅनडाच्या मुलाला ३० लाखांच पॅकेज, ऑस्ट्रेलिया वाल्याला ३५ चं पॅकेज आणि आम्हांला लाख भर पेन्शन… त्या आसारामचा सारा खेळ रोजचा हजार दोन हजाराचाच. पण काय थाट. साधा पाण्याचा मातीचाच माठ पण थंडगार पाणी, जेवण सोन्यावाणी.

आता कोण सुखी तुम्हीच सांगा शंकरराव…… तो आसाराम का मी एक्स कमिशनर… माझ्याकडे कुत्रं नाही. आसारामकडे माणसंच माणसे… आता बोला आम्ही वांझ नाही तर काय आहोत.

परवा मोठ्या मुलाला ही बोलली ‘ एकदा ये महिनाभरासाठी ‘. तर तो म्हणाला ‘ महिनाभरासाठी? मला एक तासाचा वेळ नाही. ’…. चिडून ही म्हणाली,”मेल्यावर तरी येणार का? नाही. तेव्हा तो काहीच बोलला नाही. फोन खाली ठेवला. सांगा शंकरराव आम्ही वांझोटे नाही तर काय आहोत ? … मला माझं काही वाटत नाही. मी गेल्यावर शेवंतीच कसं होईल हीच चिंता आहे. नापास मुलंच आई बापांचा खरा आधार आहेत. आसारामचं एक पोरगं मॅट्रीक पास नाही, पण त्याच्या इतका सुखी कुणी नाही….. परवा आसारामच्या मुलानं हिला दवाखान्यात नेलं आणलं. आसारामच्या सुनाने स्वयंपाक करुन दिला.

काय मिळवलं मी कुणासाठी?… मुलं म्हणतात आम्हाला तुमचं घर नको शेती नको…

… आणि आणि तु…. म्हीही न.. को.. त.”

सुधाकररावांचे डोळे भरून आले. शंकररावांनाही नाही आवरले.

शकंररावांनाही मुलं जास्त काही मोठी झाली नाही याची जी खंत होती, ती दुर झाली.

सुधाकरराव एकदम कठोर झाले. म्हणाले…

“मी वांझोटा नाही राहणार. मी माझं सारं सारं आसारामच्या मुलांना दान करणार. बदल्यांत फक्त प्रेमळ चटणी भाकरीचाच सहवास मागणार. बाकी काही नको.”

जीवन केवळ धन नाही तर सुखी मन खरं धन आहे.

मुलं आय आय टी झाली आणि आय माय टी ला म्हणजे चहाला महाग झाली.

मुलं असावीत पण कामाची असावीत. नसता काय नुसती पाटी लावायला कशाला हवीत.

… शंकररावांनी घरी परततांना नातवंडासाठी एक नाही दोन टरबूज घेतले आणि समाधानाने घराकडे धावले. त्यांचं गोकुळ त्यांची वाट पहात होते.

– – सहकुटुंब सहपरिवार …. तेथे आनंदाला नाही पारावर.

– – – वरील बोधप्रद पण सत्य वस्तुस्थिती आहे.

मोठे घर पोकळ वासा, हवा की घर गोकुळासारखे भरलेले पाहीजे.

पैसा हवा की, समाधान शांती…. प्रेम हवयं की, दुरावा….. एकलकोंडे रहायचं की, आनंदी परीवारात.

… माणुसकी हवी की, फक्त पैसा……. या सर्व गोष्टींचा विचार करण्याची खरी गरज आहे…

म्हणून पालकांनो आपल्या मुलींना गोकुळासारखे घर भरलेले असलेल्या परीवारातच द्या. म्हणजे ती एकटी पडणार नाही. तुमच्या मुलीला सुख समाधान समृध्दी आनंद अशाच परीवारात मिळेल जेथे माणसेच रहातात. चांगली माणसें चांगला परीवार पाहून आपण आपल्या मुली अशाच घरी द्या.

योग्य वेळी योग्य वयातच मुलामुलींचे विवाह करा. भौतिक सुखाची अवास्तव अपेक्षा करु नका. हे क्षणिक सुख आहे…….

इतरांच्या घरी माणिक मोती पैसा कणसं ।

माझ्या घरी लाख मोलाची जीवाभावाची माणसं ।।

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares