मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “खरंच आम्ही वांझ आहोत…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ “खरंच आम्ही वांझ आहोत…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

खरंच आम्ही वांझ आहोत…

(बहुतांश उच्चशिक्षित लोकांच्या घरातील भयाण वास्तव.) 

“नमस्कर सुधाकरराव, फार दिवसांनी भेटलात.”

“होय खरे आहे, मी इथे नव्हतो. तिकडे कॅनडा ला गेलो होतो.” सुधाकरराव बोलले.

“कॅनडाला?” शंकरराव म्हणाले.

“होय दोन मुले होती. एक आहे कॅनडाला, दुसरा ऑस्ट्रेलियाला.”.. सुधाकरराव म्हणाले

”अहो. होती काय म्हणत आहात?” शंकररावांनी आ वासुन विचारले.

…”नाहीतर काय म्हणणार. आज भारतात आम्ही दोघेच आहोत.” शंकरराव बोलते झाले…” वय झालं आहे. तिचं सततचं दु:खणं असतं. दवाखान्यात न्यायला कुणी सोबत नाही. साधी दूधाची पिशवी कुणी आणायची हा प्रश्न आहे. तो शेजारचा आसाराम माझ्या पेक्षा कैक पटीने सुखी आहे. चारपाच मुलं, दोन-तीन मुली, आठ दहा नातवंडं… नुसता गोंधळ असतो. त्याचे कुणी पाय चोपत असतं, तर डोकं चोपत असतं, तर कुणी डोक्याला तेल लावतं असतं… साधा खोकला आला तर चार चार जण आसारामला उचलतात, दवाखान्यात नेतात, सलाईन लावतात. पलंगावर दोघं जण उषा पायथ्याला बसतात. दवाखान्याबाहेर आठजण बसून असतात. कुणी शिरा आणतं, कुणी सफरचंद आणतं, कुणी बिस्किटं आणतयं. आसारामच्या दिमतीला पंधरा माणसं…… आमचा मोठा बंगला, लाखभर पेन्शन, अलिशान गाडी, पण साधं गेट उघडायला कुणी नाही. गाडी चालवायला कुणी नाही. त्या आसारामच्या दारात मोडक्या तोडक्या का असेना चार पाच बाईक उभ्या असतात. कुणी भाजी आणतयं, कुणी पिण्याचं जार आणतंय, कुणी दळण आणतंय, कुणी भेटायला आलेल्या पाहुण्याला सोडायला जातंय, कुणी स्टॅन्डवरच्या पाहुण्याला आणायला जात असतंय. म्हतारी दोनचार नातवाला घेवून किराणा दुकानांवर दिवसभर चकरा मारत असते.

रात्री बारा वाजेपर्यंत यांचा आरडा ओरडा, गप्पा, हास्य कल्लोळ चालुच असतो. दहा बारा पत्र्यांचं घर आणि अंगण कस गजबजलेलं असतं… माझ्या कॅनडाच्या मुलाला ३० लाखांच पॅकेज, ऑस्ट्रेलिया वाल्याला ३५ चं पॅकेज आणि आम्हांला लाख भर पेन्शन… त्या आसारामचा सारा खेळ रोजचा हजार दोन हजाराचाच. पण काय थाट. साधा पाण्याचा मातीचाच माठ पण थंडगार पाणी, जेवण सोन्यावाणी.

आता कोण सुखी तुम्हीच सांगा शंकरराव…… तो आसाराम का मी एक्स कमिशनर… माझ्याकडे कुत्रं नाही. आसारामकडे माणसंच माणसे… आता बोला आम्ही वांझ नाही तर काय आहोत.

परवा मोठ्या मुलाला ही बोलली ‘ एकदा ये महिनाभरासाठी ‘. तर तो म्हणाला ‘ महिनाभरासाठी? मला एक तासाचा वेळ नाही. ’…. चिडून ही म्हणाली,”मेल्यावर तरी येणार का? नाही. तेव्हा तो काहीच बोलला नाही. फोन खाली ठेवला. सांगा शंकरराव आम्ही वांझोटे नाही तर काय आहोत ? … मला माझं काही वाटत नाही. मी गेल्यावर शेवंतीच कसं होईल हीच चिंता आहे. नापास मुलंच आई बापांचा खरा आधार आहेत. आसारामचं एक पोरगं मॅट्रीक पास नाही, पण त्याच्या इतका सुखी कुणी नाही….. परवा आसारामच्या मुलानं हिला दवाखान्यात नेलं आणलं. आसारामच्या सुनाने स्वयंपाक करुन दिला.

काय मिळवलं मी कुणासाठी?… मुलं म्हणतात आम्हाला तुमचं घर नको शेती नको…

… आणि आणि तु…. म्हीही न.. को.. त.”

सुधाकररावांचे डोळे भरून आले. शंकररावांनाही नाही आवरले.

शकंररावांनाही मुलं जास्त काही मोठी झाली नाही याची जी खंत होती, ती दुर झाली.

सुधाकरराव एकदम कठोर झाले. म्हणाले…

“मी वांझोटा नाही राहणार. मी माझं सारं सारं आसारामच्या मुलांना दान करणार. बदल्यांत फक्त प्रेमळ चटणी भाकरीचाच सहवास मागणार. बाकी काही नको.”

जीवन केवळ धन नाही तर सुखी मन खरं धन आहे.

मुलं आय आय टी झाली आणि आय माय टी ला म्हणजे चहाला महाग झाली.

मुलं असावीत पण कामाची असावीत. नसता काय नुसती पाटी लावायला कशाला हवीत.

… शंकररावांनी घरी परततांना नातवंडासाठी एक नाही दोन टरबूज घेतले आणि समाधानाने घराकडे धावले. त्यांचं गोकुळ त्यांची वाट पहात होते.

– – सहकुटुंब सहपरिवार …. तेथे आनंदाला नाही पारावर.

– – – वरील बोधप्रद पण सत्य वस्तुस्थिती आहे.

मोठे घर पोकळ वासा, हवा की घर गोकुळासारखे भरलेले पाहीजे.

पैसा हवा की, समाधान शांती…. प्रेम हवयं की, दुरावा….. एकलकोंडे रहायचं की, आनंदी परीवारात.

… माणुसकी हवी की, फक्त पैसा……. या सर्व गोष्टींचा विचार करण्याची खरी गरज आहे…

म्हणून पालकांनो आपल्या मुलींना गोकुळासारखे घर भरलेले असलेल्या परीवारातच द्या. म्हणजे ती एकटी पडणार नाही. तुमच्या मुलीला सुख समाधान समृध्दी आनंद अशाच परीवारात मिळेल जेथे माणसेच रहातात. चांगली माणसें चांगला परीवार पाहून आपण आपल्या मुली अशाच घरी द्या.

योग्य वेळी योग्य वयातच मुलामुलींचे विवाह करा. भौतिक सुखाची अवास्तव अपेक्षा करु नका. हे क्षणिक सुख आहे…….

इतरांच्या घरी माणिक मोती पैसा कणसं ।

माझ्या घरी लाख मोलाची जीवाभावाची माणसं ।।

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘जीभ…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘जीभ…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर

जिभेला कधीच सुरकुत्या पडत नाहीत.

जिभेला चिरकाल यौवन प्राप्त झालेले आहे.

माणूस हवा तेवढा वृध्द होवो, देहावर कितीही सुरकुत्या पडोत, डोळ्यांनी दिसत नसू दे, तरतरी नाश पावू दे, पण जीभ कधीच म्हातारी होत नाही. तिचा आवेश आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत तसाच टिकून राहतो !

जिभेचं रूप-स्वरूप बरंच लहान आहे, पण या लहानशा इंद्रियावर विजय मिळवणं, कठीणातलं कठीण काम आहे

मुख-म्यानात राहणारी जीभ ही दुधारी तलवार आहे. ही जीभ ताब्यात राहावी म्हणून निसर्गाने दातरूपी बत्तीस चौकीदार बसविलेले आहेत. पण जीभ अशी जबरी आहे की, कालांतराने दातांनादेखील उखडून टाकते तशीच तोडूही शकते.

कुणाला ती घायाळ करते,

तर कुणाच्या जखमाही बुजवून टाकते.

तिच्यातून अमृत झरते,

तसेच हलाहल विषदेखील निर्माण होते.

जिभेची जमीन अशी विचित्र आहे की, तिथे फुले फुलतात, तसेच काटेही उगवतात.

अतिश्रमाने देहाचा प्रत्येक अवयव थकतो, ज्ञानतंतू थकतात. पण जिभेला असे यौवन प्राप्त झालेले आहे की तिला कधीच थकवा जाणवत नाही. अनेक प्रकारच्या प्रचंड शक्ती धारण करणाऱ्या ह्या इवल्याशा जिभेवर ताबा मिळविणे हे दुष्कर काम आहे आणि जे लोक जिभेवर उत्तम ताबा मिळवू शकतात, तितक्याच प्रमाणात ते खरे जीवन जगू शकतात. कटू, पण त्रिकाल सत्य…

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ देवघर… लेखक – अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

देवघर… लेखक –  अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

आपण सगळे सश्रद्ध लोक वर्षातून एकदोनदा किंवा आणखी काही वेळा निरनिराळ्या तीर्थक्षेत्री जाऊन देवदर्शन घेतो.

काही आणखी सश्रद्ध माणसं तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी देवदर्शन घेतात. एखाद्या मठात, देवळात नित्यनेमाने जातात. देवालय हे एक पवित्र स्थान असते, यात शंका नाही. कारण, देवळात रोज त्रिकाळ पूजाअर्चा, अभिषेक, मंत्रोच्चार वगैरे सुरु असतात. तिथे वेगळी शक्तिस्पंदने असतात.

पण माझ्या मते आपल्या निवासस्थानातील देवघर ही जागादेखील तितकीच बलवान आणि उत्कृष्ट असते, हेही कायम लक्षात ठेवा.

तुमच्या देवघरातील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा झालेली नसेलही, रोजच्या रोज कदाचित षोडशोपचार पूजाही होत नसेल; पण आपल्या खाजगी कौटुंबिक देवघराविषयी आपल्या मनात खास स्थान असते. आपण निदान तिथे रोज हात जोडून प्रार्थना करत असतोच. आपल्या प्रार्थनांची सकारात्मक शक्ती देवघरात एकवटलेली असते. तुमच्या देवघरातील मूर्तींशी तुमचं विशेष कनेक्शन असतं…आईने माहेरहून दिलेली अन्नपूर्णा, बाळकृष्ण, आजोबांनी हरिद्वारहून कोणे एके काळी आणलेला शाळिग्राम, आजीने रामेश्वरहून आणलेलं दगडी शिवलिंग, एखादं पुरातन नाणं, अनेक पिढ्या देवघरात सुखेनैव असलेला खंडोबाचा टाक… काय नं काय…

ही सगळी मंडळी तुमची परिचित असतात. रोज तुमच्या प्रार्थना ते ऐकतात, तुमच्या खापर पणजोबांचे शब्दही त्यांच्या कानी पडलेले असतात. तुमचे कठीण संघर्षांचे, कटकटीचे, आनंदाचे, सुखाचे सगळे दिवस त्यांच्यापैकी प्रत्येकाने अनिमिष नेत्रांनी बघितलेले असतात. तुम्ही कधीही घराबाहेर गेलात तरी तुमच्या अनुपस्थितीत देवघर घराची काळजी घेतं, यावर तुमचा ठाम विश्वास असतो. जुने देव भग्न झाले किंवा अन्नपूर्णेची पळी मोडली तरी तुमचं मन खट्टू होतं. काही अपरिहार्य कारणांमुळे देव विसर्जन करावे लागले तर तुम्ही डिस्टर्ब होता, नवीन बनविलेल्या मूर्तींशी कनेक्ट व्हायला तुम्हाला वेळ लागतो.

प्रत्येक मूर्तींशी तुमचं सुरेख नातं असतं.

जुन्या शाळिग्रामवरचा एक चकचकीत ठिपकाही तुम्हाला माहिती असतो. समर्थांच्या मूर्तीच्या पाटावरचं डिझाईनही तुमच्या नीट लक्षात राहतं.

लक्षात ठेवा…. तुमचं देवघर हे खूप सुरेख शक्तिपीठ आहे. ते कायम सुंदर ठेवा, स्वच्छ ठेवा, फाफटपसारा न मांडता आटोपशीर आणि देखणं ठेवा. रोज जमेल तशी पूजा करा.मूर्ती अधूनमधून उजळवा. रोज तुपाचे निरांजन, चंदन उदबत्ती लावून वातावरण प्रसन्न ठेवा. तुमचे घरचे देव, कुलदेवता आणि सद्गुरु  पण महत्त्वाचे आहेत.

लेखक: अज्ञात

संग्राहक – श्री अनंत केळकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “बायको वाल्या कोळ्याची…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “बायको वाल्या कोळ्याची…” – लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

बायको कशी असावी ?

बायको असावी तर, वाल्या कोळयाच्या बायकोसारखी…

वाचायला जर विचित्र वाटतंय ना ?पणआज तिचीच गरज आहे.

 रामायण न वाचलेला किंवा टीव्हीवर रामायण न पाहिलेला, निदान रामायण या ग्रंथाचे नाव माहिती नसलेला माणूस, या भारतात तरी अपवादानेच असावा. रामायण, म्हटले की, आम्हां भारतीयांचा ऊर केवढा भरून येतो.

रामायण आपल्या संस्कृतीचा ठेवा असून रोजच्या जगण्यात, पावलोपावली त्याचे दाखले दिले जातात… !

 

 ‘पुत्र असावा तर, प्रभुरामासारखा’!

 ‘पती असावा तर, मर्यादापुरूषोत्तम श्रीरामासारखा !’,

भाऊ असावा तर, लक्ष्मणासारखा !’,

 ‘पत्नी असावी तर, सीतेसारखी !’

 ‘भक्ति व शक्ति असावी तर, ती हनुमंतासारखी!’

 

सहजच माझ्या मनात एका प्रश्नाने घर केले, ‘बायको कशी असावी?’

 

 मी तो प्रश्न आजपर्यंत बऱ्याच जणांना विचारला, खूप साऱ्या जणांनी त्याचे उत्तर त्यांना आवडणाऱ्या वेगवेगळ्या स्त्रियांचे दिले. अगदी रामायण महाभारतात असलेल्या आदर्श स्त्रिया ते अगदी आताच्या आघाडीवर असलेल्या अभिनेत्रीचे! खरं तर या सर्व दाखल्यापूर्वी आणखी एक दाखला आवर्जून द्यायला हवा.

तो म्हणजे,

‘बायको असावी तर वाल्या कोळ्याच्या बायकोसारखी !’

कारण तीच खरी रामायणकर्त्याची ‘कर्ती ‘ आहे !हे दुर्लक्षित सत्य कायमच दुर्लक्षितच राहिले आहे.

 

रामायणकर्त्या वाल्मिकी ऋषीच्या जडणघडणीसंबधी, अगदी जुजबी इतिहास सांगितला जातो.

 

वाल्या कोळी वाटसरूंना जंगलात

अडवून, प्रसंगी त्यांचे मुडदे पाडून, त्यांची लूट करुन चरितार्थ चालवायचा.

एकदा नारदमुनींनाच वाल्याने अडवले. तेव्हा नारदमुनींनी त्याचे तिथल्या तिथे बौद्धिक घेतले!

 

“अरे मूर्खा हे पापकर्म कशासाठी करतोस ?”असे विचारल्यावर, “माझ्या बायको-पोरांसाठी!”

 असं सांगितल्यावर, नारदमुनी त्याला म्हणतात, “जा. तुझ्या बायकोला विचारुन ये, ते तुझ्या पापात सहभागी आहेत काय?”

“तुम्ही इथेच थांबा, मी विचारून येतो, ” असे म्हणत, वाल्या पळतच घरी येतो. दारावर धाडकन् लाथ मारून घरात घुसतो. बायकोमुलं घाबरतात.

वाल्या बायकोला धमकावून विचारतो. “बोल. तू माझ्या पापात सहभागी आहेस की, नाही?”

 

 आता असा विचार करा! शेकडो माणसांचे मुडदे पाडलेला, खांद्यावर लखलखती कुऱ्हाड घेतलेला, क्रूरकर्मा, दरोडेखोर नवरा असा संतापल्यावर, एक अशिक्षित, अडाणी, परावलंबी स्त्री दुसरं काय उत्तर देणार?

 

पण नाही. त्या तडफदार आदिमाया शक्तीने, क्षणाचाही विचार न करता, “नाही, मी तुमच्या पापात सहभागी नाही!”असे सडेतोडपणे सांगितले.

 

नंतर तीच घटना वाल्या कोळ्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणारी ठरली.

 

गरीबबापड्या बायकोच्या अनपेक्षित तडफदार उत्तराने वाल्या कोळ्याचे डोळे खाडकन् उघडतात.

तो नारदमुनीची क्षमायाचना करतो. नारदमुनी त्याला दीक्षा देतात. तो तप करतो आणि दरोडेखोर वाल्या कोळ्याचा वाल्मिकीऋषी होऊन रामायण हे महाकाव्य रचतो.

 

ही सरळसाधी गोष्ट आपण वाचून सहज सोडून देतो. पण, एक साधी शंका कुणाच्याही मनात का येत नाही? की,

समजा, वाल्या कोळ्याच्या बायकोने, ‘व्हयं.. आम्ही आहोतच की, तुमच्यासंगं !’ असं सर्वसाधारण, सोईचं उत्तर दिलं असतं तर?

 

नारदाचं काही खरं नव्हतंच.

पण, वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊन, त्याने रामायण तरी कसे काय रचले असते?

अशी रास्त शंका घेता येऊ शकते !

 

पापाचा पैसा कमावणाऱ्या पती -परमेश्वराला, उंबऱ्यातच अडवून ते पाप घरात घ्यायला, त्या पापात सहभागी व्हायला, आजच्या ‘सुसंस्कृत भारतीय गृहिणी’ नकार देतील तर, बोकाळलेला भ्रष्टाचार नक्कीच कमी होईल.. !

 

फक्त त्यांनी वाल्याच्या बायकोचा आदर्श मात्र अंगीकारला पाहिजे.

असे घडल्यास भारत भ्रष्टाचारमुक्त होऊन जागतिक महासत्तेच्या दिशेने निश्चित वाटचाल करेल !

पुन्हा एकदा आपल्या भारत ‘भू’ वर निश्चितच रामराज्य अवतरेल व अनेक वाल्या कोळी वाल्मिकी मुनींमध्ये रूपांतरित झालेले पाहण्याचे भाग्य आपणांस लाभेल… यात शंकाच नाही…!

  ☆

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मीच माझी व्हॅलेंटाईन!… कवी : सौ. शुभांगी पुरोहित ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

सौ. स्मिता पंडित

? वाचताना वेचलेले ?

मीच माझी व्हॅलेंटाईन!... कवी : सौ. शुभांगी पुरोहित ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित

माझ्या मनाचे गाणे

 माझ्यासाठीच गाईन

आवडत्या ठिकाणी माझ्या,

माझ्याच बरोबर जाईन.

कारण मीच माझी व्हॅलेंटाईन,

मीच माझी व्हॅलेंटाईन.

 

इतरांसाठी जगण्याचा

काळ मागे गेला,

वाळूसारखा हातातून

काळ निसटून गेला.

 

दुसऱ्यांचे शब्द जितके

फुलासारखे झेलले.

तितके तितके तेही मला

गृहीत धरत गेले.

 

ताट होते माझे

पण मेन्यू होता त्यांचा.

प्रवास होता माझा

 पण व्हेन्यू होता त्यांचा.

 

यालाच मी प्रेमाची

व्याख्या म्हणत गेले.

बेमालूमपणे मनाला

अलगद फसवत गेले.

 

फसवे असले बंध सारे

हलकेच सोडवत जाईन.

कारण मीच माझी व्हॅलेंटाईन,

 मीच माझी व्हॅलेंटाईन.

 

मित्र मैत्रिणी, सगे सोयरेही

 महत्त्वाचे असतात.

स्टेशन येता ज्याचे त्याचे

उतरून सर्व जातात.

 

कुठे माहीत कोणा कोणाची

कुठपर्यंत साथ?

आपल्या हाती शेवटपर्यंत

 फक्त आपलाच हात.

 

सन्मान करेन स्वतःचा,

स्वानंदात राहीन.

कारण मीच माझी व्हॅलेंटाईन,

मीच माझी व्हॅलेंटाईन.

 

गुलाबाची सुंदर फुले

स्वतःलाच घ्यायची.

दुसरं कोणी देईल म्हणून

 वाट कशाला पाहायची?

 

शुगर आहे, बी पी आहे

असायचंच की आता.

देवाइतकाच धन्वंतरी

या देहाचा त्राता.

 

८०% डार्क चॉकलेटचा

अख्खा बार घेईन.

कारण मीच माझी व्हॅलेंटाईन,

मीच माझी व्हॅलेंटाईन.

कवी: सौ. शुभांगी पुरोहित

प्रस्तुती : सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “विसंगती…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ “विसंगती…” ☆ श्री जगदीश काबरे

२५ नोव्हेंबर, १९४९ला संविधान सभेत डॉ. आंबेडकरद्वारा दिल्या गेलेल्या भाषणातील महत्त्वाचे आणि आजच्या काळासाठी अत्यंत चिंतनीय असे हे उद्धृत. . .

२६ जानेवारी १९५० ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत. राजकारणात आपल्याकडे समता राहील; परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपल्याकडे विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्त्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र, सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे, प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्त्व आपण नाकारत राहणार आहोत.

अशा परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत? आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपण आणखी किती काळ समता नाकारणार आहोत? आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो, तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती शक्य होईल, तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे. अन्यथा ज्यांना विषमतेचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत, ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाहीची संरचना उध्वस्त करतील.

लेखक : अज्ञात  

माहिती संग्राहक व प्रस्तुती : जगदीश काबरे 

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रेमाची ताकद… – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ प्रेमाची ताकद – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

एकदा स्वर्गात कृष्ण आणि राधा समोरासमोर आले.

गोकुळातून गेल्यापासून राधा आणि कृष्ण कधीच भेटले नव्हते.

अचानक समोर आल्यावर कृष्ण गडबडला ,पण राधा शांतचित्त होती.

गांगरून कृष्ण काही बोलण्याआधी स्मित वदनाने राधा म्हणाली…..

“कसे आहात द्वारकाधीश ?”

जी राधा त्याला ‘कान्हा’ ‘कान्हा’ म्हणायची तिने ‘द्वारकाधीश’ असे संबोधल्यावर कृष्ण नाराजीने म्हणाला, “राधे, मी आजही तुझा कान्हाच आहे. तू तरी मला द्वारकाधीश म्हणू नकोस …! खूप दिवसांनी भेटतो आहोत, एकमेकांशी सुख दुःखाच्या गप्पा मारू. एवढ्या धावपळीत मला जेव्हा जेव्हा तुझी आठवण यायची, तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रूंची धार लागत होती.”

राधा म्हणाली, “खरं सांगू ? मला असं काहीच होत नव्हतं. मला कधीच तुझी आठवण आली नाही की तुझ्या आठवणीने डोळ्यातून पाणी आले नाही.”

“कारण तुझी आठवण यायला मी कधी तुला विसरलेच नाही. आणि माझ्या नजरेत तूच होतास. त्यामुळे अश्रूंबरोबर तू वाहून जाऊ नयेस, म्हणून मी कधी रडलेच नाही.

प्रेम विसरून तू मात्र काय काय हरवून बसलास ते सांगू?”

श्रीकृष्ण ऐकतच राहिला…

राधा म्हणाली, “तुला कदाचित कटू वाटेल पण हे सत्य आहे, गोकुळातून गेल्यापासून तू आम्हाला कोणाला कधीच भेटला नाहीस.तू खूप मोठा झालास, तुझी कीर्ती तिन्ही लोकांत पसरली.

पण ह्या प्रगतीमध्ये तुझी किती अधोगती झाली? यमुनेच्या पवित्र, गोड पाण्याने तुझे आयुष्य सुरु झाले.त्या पाण्यावरच तू वाढलास आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्यापाशी जाऊन पोहोचलास ( द्वारका समुद्रकिनारी होती/आहे).

एका बोटावर फिरणाऱ्या सुदर्शन चक्रावर भरोसा ठेवलास, पण दहा बोटांनी वाजणाऱ्या बासरीला विसरलास!

कान्हा, जेव्हा तू प्रेमाच्या सान्निध्यात होतास, तेव्हा एका बोटावर गोवर्धन उचलून हजारो जीव वाचवलेस आणि प्रेमापासून दूर गेल्यावर सुदर्शन चक्राने कित्येक जीव घेतलेस!

कान्हा आणि द्वारकाधीश ह्यांत काय फरक आहे सांगू ….?

तू कान्हा असतास, तर तू सुदामाच्या घरी गेला असतास. सुदामाला तुझ्या घरी झोळी पसरून यावं लागलं नसतं!

प्रेम आणि युद्ध ह्यांत हाच मोठा फरक आहे … ‘युद्धात जीव घेतला जातो आणि प्रेमात जीव ओवाळून टाकला जातो’. कान्हा, प्रेमात माणूस स्वतः दुःखी राहू शकतो, पण दुसऱ्याला दुःखी करु शकत नाही !

तू तर त्रैलोक्याचा स्वामी आहेस.महान भगवद्गीता तू जगाला सांगितलीस पण तू स्वतः काय निर्णय घेतलास?

तू राजा होतास, प्रजेचा पालक होतास आणि तुझे सैन्य तू कौरवांना देऊन टाकलेस?

तू स्वतः अर्जुनासारख्या महारथीचा सारथी बनलास, त्याचा मार्गदर्शक बनलास,ज्या अर्जुनाने तुझे सैन्य तुझ्यासमोर मारून टाकले?

तुझे सैन्य तुझी प्रजा होती ना? आणि प्रजा ही स्वतःच्या मुलांप्रमाणे असते ना? तुझ्यातील प्रेम भावना नष्ट झाल्यामुळेच तू असा विनाश बघू शकलास !

इतका तुला अभिमान होता ना तुझ्या सामर्थ्याचा? मग जा, पृथ्वीवर जाऊन बघ. …. तुझी द्वारकाधीशवाली प्रतिमा शोध.

नाही सापडणार तुला शोधूनही !

जिथे जाशील तिथे घरांत, मंदिरात सर्वत्र तुझ्या बाजूला तुला मीच उभी असलेली दिसेन.

होय. कान्हा मला गीतेचे महत्त्व माहीत आहे. आजही पृथ्वीवर गीता माणसांना ज्ञान देते, मार्ग दाखवते. माणसं ही गीतेला पूज्य मानतात .पण ते भरवसा मात्र युद्ध करणाऱ्या द्वारकानरेश श्रीकृष्णावर नाही, तर प्रेम करणाऱ्या कान्हावर ठेवतात.

गीतेमध्ये माझा – राधेचा – तर दुरूनही उल्लेख नाहीये.पण आजही लोकं गीतेचा- तुझ्या महान भगवद्गीतेचा- समारोप करताना ‘राधेकृष्ण राधेकृष्ण’ असाच जप करतात!”   

हीच ती प्रेमाची खरी ताकद…!

 

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: सौ.प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वन बेडरुम फ्लॅट…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “वन बेडरुम फ्लॅट” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

माझ्या वडिलांचे स्वप्न होते, की मी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करून अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीला लागावे. जेव्हा मी अमेरिकेत आलो, तेव्हा हे स्वप्न जवळपास पूर्ण होत आले होते.

आता शेवटी, मला जिथे हवे तिथे मी पोहोचलो होतो. मी असे ठरवले होते की पाच वर्ष मी इथे राहून बक्कळ पैसा कमवेन, जेणेकरुन भारतात गेलो की पुण्यासारख्या शहरात सेटल होईन.

माझे वडील सरकारी नोकरीत होते. त्यांची आयुष्यभराची कमाई म्हणजे एक बेडरुमचा फ्लॅट अन तुटपुंजी पेन्शन. पण मला त्यांच्यापेक्षा जास्त कमवायचे होते. घरची, आई-बाबाची खूप आठवण यायची. एकटं वाटू लागायचं. स्वस्तातलं एक फोन कार्ड वापरून मी आठवड्यातन २-३ वेळा त्यांना कॉल करत होतो. दिवस वार्‍यासारखे उडत होते. दोन वर्षं पिझ्झा- बर्गर खाण्यात गेली. अजून दोन वर्षं परकीय चलनाचे दर पाहण्यात गेली. रुपयाची घसरण झाली की मला जाम आनंद व्हायचा.

लग्नासाठी रोज नवनवीन स्थळ येत होती. शेवटी ते करण्याचा मी निर्णय घेतला. आईवडिलांना सांगितले, मला फक्त दहा दिवसांची सुट्टी मिळेल. त्या दहा दिवसातच सर्व काही झालं पाहिजे. स्वस्तातलं तिकीट पाहून मी दहा दिवसांची सुट्टी घेतली. मी खूश होतो. आईबाबांना भेटणार होतो. नातेवाईक व मित्रांसाठी खूप सार्‍या भेटवस्तू घ्यायच्या होत्या, त्याही राहून गेल्या.

घरी पोहोचल्यावर आलेल्या सर्व स्थळांचे फोटो मी पाहिले. वेळ कमी असल्याने त्यातीलच एका मुलीची निवड केली. मुलीचे वडील समजूतदार होते. दोन दिवसांत माझे लग्न लागले. खूप सारे मित्र येतील, असं वाटत असताना फक्त बोटावर मोजता येतील, इतकेच मित्र लग्नाला आले.

लग्नानंतर काही पैसे आईबाबांच्या हातावर टेकवले. “आम्हाला तुझे पैसे नकोत रे पोरा. पण वरचेवर भेटायला येत जा, ” असं बाबांनी सांगताना त्यांचा आवाज खोल गेला होता. बाबा आता थकले होते. चेहर्‍यावरच्या सुरकुत्या, पिकलेल्या भुवया त्याची जाणीव करून देत होत्या. शेजार्‍यांना त्यांची काळजी घेण्याची विनंती केली व आम्ही अमेरिकेला पोहोचलो.

पहिली दोन वर्षं बायकोला हा देश खूप आवडला. वेगवेगळे स्टेट्स अन नॅशनल पार्क पाहुन तिला भारी वाटत होतं. बचत कमी होऊ लागली, पण ती खूश होती. हळूहळू तिला एकाकी वाटू लागलं. कधीकधी ती आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा भारतात फोन करु लागली. दोन वर्षांनी आम्हाला मुले झाली. एक मुलगा अन एक मुलगी. मी जेव्हा जेव्हा आईबाबांना कॉल करायचो, तेव्हा तेव्हा ते नातवंडाना घेऊन भारतात येण्याची विनवणी करायचे. त्यांना नातवंडाना पाहायचे होते.

दरवर्षी मी सहकुटुंब भारतात जायचे ठरवायचो. पण पैशाचं गणित काही जुळायचं नाही. जाण्याचा बेत रद्द करावा लागायचा. वर्षामागून वर्षं सरत होती. भारतात येऊन जायचे स्वप्न लांबत चालले होते.

एक दिवस अचानक ऑफीसमध्ये असताना भारतातून कॅाल आला, “मोहन, बाबा सकाळीच गेले रे”. खूप प्रयत्न केला, पण सुट्टी काही मिळाली नाही, अग्नीला तर सोडाच, पण नंतरच्या विधींनापण जायला जमलं नाही. मन उद्विग्न झालं. दहा दिवसात दुसरा कॅाल आला, आईची पण प्राणज्योत मालवली होती. सोसायटीतील लोकांनी विधी केले. नातवंडांचे तोंड न पाहताच आई-वडील ह्या जगातून निघून गेले होते.

आई- बाबा जाऊन दोन वर्षं सरली. ते गेल्यानंतर एक पोकळी तयार झालेली. आईबाबांची शेवटची इच्छा, इच्छाच राहिलेली.

मुलांचा विरोध असतानाही भारतात येऊन स्थिरस्थावर होण्याचे मी ठरवले. पत्नी मात्र आनंदात होती. राहण्यासाठी घर शोधत होतो, पण आता पैसे कमी पडत होते. नवीन घरही घेता आले नाही. मी परत अमेरिकेत आलो. मुले भारतात राहायला तयार नसल्याने त्यांनापण घेऊन आलो.

मुले मोठी झाली. मुलीने अमेरिकी मुलासोबत लग्न केलं. मुलगाही आनंदात अमेरिकेत राहतो.

मी ठरविले, आता पुरे झाले. गाशा गुंडाळून भारतात आलो. चांगल्या सोसायटीत ‘दोन बेडरुमचा’ फ्लॅट घेण्यापुरते पैसे माझ्याकडे होते. फ्लॅटही घेतला.

आता मी साठ वर्षाचा आहे. ह्या ‘दोन बेडरुमच्या’ फ्लॅटमधे आता मी फक्त एकटाच राहतो. उरलेलं आयुष्य जिच्यासोबत आनंदात घालवायचं ठरवलेलं, तिने इथेच जीव सोडला.

कधीकधी मला वाटते, हा सर्व खटाटोप केला, तो कशासाठी? याचे मोल ते काय?

माझे वडील भारतात राहत होते, तेव्हा त्यांच्या नावावरही एक फ्लॅट होता. माझ्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त काही नाही. फक्त एक बेडरुम जास्त आहे. त्या एका बेडरुमसाठी मी माझे आईवडील गमावले, मुलांना सोडून आलो, बायको पण गेली.

खिडकीतून बाहेर पाहताना मला माझे बालपण आठवते. त्या सुंदर आठवणी मनात फेर धरू लागतात.

अधूनमधून मुलांचा अमेरिकेतून फोन येतो. ते माझ्या तब्येतीची चौकशी करतात. अजूनही त्यांना माझी आठवण येते, यातच समाधान आहे.

आता जेव्हा माझा मृत्यु होईल, तेव्हा कदाचित शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करतील. देव त्यांचं भलं करो.

पुन्हा प्रश्न कायम आहे – हे सर्व कशासाठी अन काय किंमत मोजून?

मी अजूनही उत्तर शोधतोय.

फक्त एका बेडरुम साठी?

जगण्याचे मोल त्यापेक्षा कितीतरी पट जास्त आहे. त्यासाठी आयुष्य पणाला लावू नका.

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “रांगोळीचा किस्सा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “रांगोळीचा किस्सा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक 

आजेसासूबाई आंघोळ उरकून, बाहेर तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढत होत्या. अनेक ठिपक्यांच्या रांगा आणि त्यांच्या सुरकुतलेल्या बोटांमधून भरभर पडणारी, न तुटणारी, ओल्या तांदूळ पिठाची ओळ. बघता बघता माझ्या डोळ्यांसमोर अनेक पाकळ्यांचं कमळ तयार झालं, तेही ओळ कुठेही न तुटता.

थोड्या वेळाने बेल वाजली. मी दार उघडलं. रोजचा भाजीवाला आला होता. त्याने आपली टोपली खाली ठेवली तर त्याचा तोल थोडा सुटून, रांगोळीच्या एका पाकळीवर ती पाटी घासली. अजून तांदूळ पिठाच्या ओळी सुकल्या नव्हत्या. त्यामुळे ती पाकळी साहजिकच विस्कटली. आजींनी इतका वेळ खपून काढलेली रांगोळी जेमतेम पंधरा मिनिटंसुद्धा टिकली नव्हती. मला खूप वाईट वाटलं.

मी त्या भाजीवाल्यावर ओरडणार, इतक्यात आजीच बाहेर आल्या.

त्यांनी भाजी घेतली, पैसे दिले आणि त्या परत आत निघून गेल्या. विस्कटलेल्या रांगोळीकडे त्यांनी पाहिलं, पण काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मी मात्र खूप वेळ हळहळत होते.

नंतर दुपारी जरा निवांत बसलो असता, मी आजींना विचारलं, इतकी खपून काढलेली सुरेख रांगोळी पंधरा मिनिटंसुद्धा टिकली नाही. तुम्हाला वाईट नाही वाटलं ?

त्या हसल्या. म्हणाल्या, रांगोळी काढीत होते तोवर ती माझी होती. ज्या क्षणी रांगोळी पूर्ण झाली, त्या क्षणी ती बघणाऱ्याची झाली. रांगोळी काढताना ज्या आनंदाची अनुभूती मला झाली होती, त्याच आनंदाची अनुभूती तुला रांगोळी बघताना झाली ना ? मग झाला रांगोळीचा उद्देश सफल !

इतकी मन लावून काढलेली सुरेख रांगोळी पूर्ण झाली, त्या क्षणी त्यांनी त्या रांगोळीतून स्वतःच्या भावना अलगद हलक्या हाताने सोडवून घेतल्या होत्या.

रांगोळीचा उद्देशच हा असतो. जीवन कितीही सुंदर असलं, तरी ते रांगोळीसारखंच क्षणभंगुर आहे, हे स्वतःला दररोज बजावून सांगण्याचा रांगोळी हा एक सुंदर मार्ग.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ लोकलचा प्रवास आणि लग्न… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

लोकलचा प्रवास आणि लग्न… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

नोकरीनिमित्त उपनगरातून मुंबईला लोकलने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे विवाह हे सहजासहजी मोडत नाहीत, अशी माहिती नुकतीच एका सर्व्हेमुळे समोर आली. यामागची कारणे जाणून घेण्यासाठी आमच्या काही प्रतिनिधींनी सोमवार ते शुक्रवार असा सलग पाच दिवस सकाळी कल्याण ते दादर असा ‘वरून’ येणाऱ्या गाडीने व पुन्हा सायंकाळी ‘दादर ते कल्याण’ असा लोकलचा प्रवास चक्क पिक अवर्समध्ये केला व त्यांना आलेल्या अनुभवांवरून यामागची काही कारणे शोधण्यात आम्हाला यश आले आहे.

सकाळी घरून निघताना एखादी फास्ट गाडी मनात ठरवून स्टेशनला यावे, तर ती गाडी वरूनच खचाखच भरून आलेली. मुंगीलाही आत शिरायला जागा नाही. नाइलाजाने ती गाडी सोडून हताशपणे दूर जाताना तिच्याकडे पहात बसायचे. नंतर एक स्लो लोकल.. बऱ्यापैकी रिकामी.. पण तुम्हाला नकोशी. मग शेवटी काँप्रोमाईज करून एक सेमीफास्ट लोकल पकडायची. ह्या रोजच्या प्रकारामुळे एक तडजोडीचा गुण माणसात तयार होतो. त्याला आवडणारी मुलगी त्याला नाकारून दुसऱ्याबरोबर लग्न करते तर जी याच्याशी लग्नाला तयार असते.. याला पसंत नसते. शेवटी घरच्यांच्या इच्छेप्रमाणे एका ‘अनुरूप’ मुलीशी विवाह करण्याची तडजोड तो याच प्रवासात शिकलेला असतो.

बरे.. तडजोड करून पकडलेल्या ह्या सेमीफास्ट गाडीतही लगेच सीट मिळत नाहीच. पण हा जरा धावपळ करून खिडकीत समोरासमोर बसलेल्या दोन माणसांच्या पुढ्यात जाऊन उभा रहातो. हे दोघे तर लवकर उठत नाहीतच; पण येणाराजाणारा प्रत्येक जण आपली बॅग स

शेल्फवर ठेवण्यास वा काढण्यास यालाच सांगत रहातात व त्यालाही तेथे उभे राहिल्याने हसतमुखाने हे काम करत राहावे लागते. यातून आपला काही फायदा असो वा नसो.. न थकता शेवटपर्यंत, इच्छा असो वा नसो.. हसतमुखाने सासुरवाडीच्या नातेवाईकांची कामे करण्याचा गुण यांच्या अंगी बाणला जातो.

अशा माणसांना गाडीत चढल्या चढल्या चुकून कधी बसायला जागा मिळालीच तर नेमके त्याच डब्यात कोणीतरी वृद्ध अथवा आजारी व्यक्ती चढते व त्याच्या समोर उभे राहून आशाळभूतपणे बघू लागते. इतर प्रवाशांच्या चेहऱ्यावरही याने उठून त्यांना जागा द्यायलाच हवी, असे भाव असतात. मग नाईलाजाने तो उभा राहून त्या वृद्धास वा आजाऱ्यास जागा करून देतो. यातूनच सासुरवाडीच्या वृद्धांची व रुग्णांची सेवा करण्याचा गुण वृद्धिंगत होतो.

लोकलच्या लेडीज डब्याचे नियम तर फार कडक. चुकून त्यात पुरुष शिरला तर बायकांचे शिव्याशाप.. क्वचित मारही खावा लागतो. त्यातून घोर अपमान व पोलिसांच्या हवाली होणार ते वेगळेच. यामुळेच चार बायका एकत्र दिसल्या की तेथून दूर होण्याच्या गुणाची निर्मिती होते. त्यामुळेच घरी हॉलमधे किटी पार्टी, भिशी, हळदीकुंकू वगैरे सुरू असल्यास हा त्यात लुडबूड न करता बेडरुममध्ये शांत पडून राहतो.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या लोकल प्रवासातून तयार होणारी प्रचंड सहनशक्ती. आपला चुकून धक्का लागला तरी खुन्नस देणाराच आपल्या शेजारी बसल्यावर मात्र पेपर वाचताना त्याचे कोपर पोटात खुपसतो.. समोरचा मोबाईल वाचता वाचता नाकात बोटं घालतो.. कुणाच्या घामाचा प्रचंड वास येत असतो.. एक ना अनेक नरकयातना या तासाभरात त्याच्या वाट्यास येत असतात व त्या शांतपणे भोगल्याने मनस्ताप सहन करण्याची प्रचंड ताकद यांच्यात तयार होते, जी संसारात पदोपदी उपयुक्त ठरते !

तसेच दिवसभर कितीही उंडारले तरी संध्याकाळी ठरलेल्या गाडीने ठरलेल्या वेळी घरी परत येणे, हाही एक वाखाणण्याजोगा गुण..

असे एक ना अनेक गुण आहेत जे पिक अवर्समधे प्रवास करणाऱ्यांच्यात निर्माण होतात, जे त्यांचे वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध करतात.

आमच्या प्रतिनिधींना आलेले हे अनुभव जेमतेम ५ दिवसांचे आहेत. पण आपण जर वर्षोनवर्षे असा प्रवास करत असाल व आपले याबाबत काही विशेष अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा !

लेखक : अज्ञात 

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares