मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ साठीची ताकद… — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ साठीची ताकद… — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

साठीची सॉलिड ताकद असते. कसे ते सांगतो तुम्हाला!

कालचीच गोष्ट सांगतो.

मी, आमचा मुलगा, आणि बायको रस्त्याने जात असताना समोरून एक समवयीन जोडपे येताना दिसले.

मी त्यातल्या बाईकडे बिनधास्त एकटक बघत होतो. बायकोच्या देखत. ही आहे साठीची खरी ताकद.

जोडपे जवळ आले.

मी त्या बाईकडे बोट दाखवत तिला तिच्या नवऱ्याच्या देखत थांबविले.

ही आहे साठीची ताकद.

“संगीता ना तू?संगीता शेवडे?” इति मी.ही आहे साठीची ताकद.

ती थोडी थबकली.

आणि तिच्या नवऱ्याच्या देखत मानेला झटका देऊन केसांचा शेपटा पाठीवर झटकून, “अय्या… Sss… भाट्या ना तू?” असे किंचाळतच म्हणाली. भाट्या माझे शाळेतले टोपण नाव.तिची साठीची ताकद.

“कित्ती वर्षांनी दिसतोयस रे! काहीच फरक नाही तुझ्यात”.

मी ढेरी आत घेऊन हसलो.

“पण आता संगीता शेवडे नाही बरं का, मी संगीता फडके… हे माझे मिस्टर.” ती बाजूच्या, तिचा काका वगैरे वाटणाऱ्या माणसाकडे बोट दाखवते.

(“काय पण  टकल्या म्हातारा निवडलाय!” हे बोलण्याची छाती साठीत अजूनही होत नाही. हे मी मनातल्या मनातच म्हणालो.)

मी आपला तोंडदेखलेपणाने देखल्या देवा दंडवत करतो. “नमस्कार.”

त्याच्या कपाळाला मात्र आठ्या! फडकेचा शेजारी किंवा आजोळ बहुधा नेने किंवा लेले असावे.

मग एकमेकांच्या अर्धांगाची सविस्तर ओळख होते.

त्यात मी बायकोला “मी नाही का खूप वेळा सांगत तुला, ती खोपोलीच्या ट्रीप मध्ये,”सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला” गायलो होतो?

तीच ही संगीता!”

ही आहे माझी साठीची ताकद.

“अय्या तुला आठवतं आहे अजून ?” संगीता लाजत म्हणते.

तिची साठीची ताकद…

मी “हो, कसं विसरणार गं?” म्हणतो… परत एकदा माझी साठीची ताकद.

“मला इतकी वर्ष वाटत होते की मी तुला नाही म्हटल्यावर तू त्या सायली बरोबर लग्न केलेस.” परत तिचीही ही साठीची ताकद.

तिच्या नवऱ्याच्या कपाळावर आठ्या वाढतात.

पण तो हताशपणे बघत असतो.

माझ्या शेजारी निद्रिस्त ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत चुळबुळ करताना जाणवतो.

“नाही गं, माझं लग्न उशीरा झालं, सायली लग्न करून कधीच अमेरिकेत गेली होती.”… मी बायकोच्या देखत म्हणतो.आता परत माझी साठीची ताकद.

इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी तिला हळूच विचारतो “येतेस का Starbucks मध्ये कॉफी प्यायला ?” माझी साठीची ताकद.

माझी बायको भुवया उंचावून बघते.

३५ वर्षांच्या संसारात तिला खात्री आहे,

मी काही Starbucksला जाण्याच्या भानगडीत पडणार नाही.

फार फार तर समोरच्या उडप्याकडेच बसणार… तिची साठीची ताकद.

नुकताच ३० वर्षाचा झालेला आपला पोरगा… “च्यामारी बाप या वयात सगळ्यांसमोर उघड उघड लाईन मारतोय!” असा आश्चर्यचकित चेहरा करून माझ्याकडे बघत होता.

मीही  पोराकडे बघून डोळे मिचकावत म्हणालो “अरे आम्ही पूर्वी पण कॉफीच प्यायचो.नाही का गं संगीता ?” माझी साठीची ताकद.

ती नवऱ्याला सांगते, “मी जरा ह्याच्या बरोबर तास भर गप्पा मारून येते.तू घरी जा आणि टॉमीला खायला घाल.”तिची साठीची ताकद.

तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर, “तास दोन तास तरी टळली ब्याद” चा आनंद स्पष्ट दिसतोय मला. पण तो लपवण्याचा क्षीण आणि निष्फळ प्रयत्न करतोय बापडा, “अगं, काही हरकत नाही.ये आरामात.” असं म्हणतो. त्याची साठीची ताकद.

“अरे पण तुझ्या बायकोची परवानगी आहे का ?” माझ्या पोटात बोट खुपसून संगीता.

“मला काय दगडाचा फरक पडतोय ?  या कधीही… नाहीतरी घरी येऊन काय दिवे लावणार आहेत कोलंबस ?”आता बायकोची  साठीची ताकद.

“फक्त येताना अर्धा किलो रवा आणि १ किलो साखर आण.” हुकुमी आणि जरबेच्या आवाजात मला.परत एकदा बायकोची साठीची ताकद.

संगीताचा नवरा कधीच गायब झाला.

माझ्या बायकोने दोन पावलं जायला म्हणून पुढे टाकली आणि वळली. “अरे हो.तुझा गोदरेजचा डाय संपलाय वाटतं. हल्ली जरा लवकरच संपतो. तो ही आण! खरे तर केसच कुठं आहेत रंगवायला? मला नेहमी आश्चर्य वाटते कुठे लावतोस कलप? आणि तुझ्या गॅससाठीच्या चघळायच्या गोळ्याही आणि कायम चूर्ण आणायला विसरू नकोस! नाहीतर सकाळी चिंतनघरात बसशील तासाच्या ऐवजी दीड तास आणि हात हलवत बाहेर येशील!” असं संगीताकडे जळजळीत नजरेने बघत तिने सांगितले… परत बायकोची साठीची ताकद.

बायकोचे माहेर कोकणात अडीवऱ्यातले आहे, म्हणजे सदाशिव पेठेतील “सौजन्याची” मर्यादा जिथे संपते तेथे तिथली सुरू होते.

संगीता त्यावर फिदीफिदी हसते.तिची पण साठीची ताकद.

मित्रांनो, अशी सगळी साठी भलतीच ताकदवान असते.

अनुभवलात की कळेलच!

लेखक : अज्ञात

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “वास्तव सत्य…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “वास्तव सत्य…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

वटारलेले डोळे पाहून दबणारी बायकोच आता  डोळे वटारून पाहू लागली की समजून घ्यावे की ‘पृथ्वीवरील आपले अवतारकार्य शेवटच्या टप्यात आहे.’

कमावत्या मुलांच्या आवाजात कडकपणा आला असेल तर समजून घ्यावे की , आपण आता कौटुंबिक जबाबदारीतून हळूहळू अंग काढून घ्यावे.

“बसल्या बसल्या ह्या  शेंगातील दाणे काढा,”असे जर सुनबाईने म्हटले तर समजून घ्यावे की, बॉस नावाचे पद यांनी खारीज केले आहे.

वय वर्ष 60 नंतर कुणी आपल्याशी चांगले वागेल, ही अपेक्षा ठेवू नका. भाऊबंदकीचे नाते  कुटुंबाचे फाळणीबरोबरच संपुष्टात आले.नातेवाईक पैसे देणे / घेणे वादातून संपले, पत्नीचा ओढा नकळत न टिकणाऱ्या मुलांच्या नात्याकडे वळू लागला , कार्यप्रसंगात नातेवाईक भेटतात, केवळ रामराम होतो ,फारसी चौकशी होत नाही, तुम्ही मात्र मनात उजळणी करत असता , ह्याला मी किती मदत केली होती.

सगळे कटू अनुभव जमा झाले असतील , कुणी नाही कुणाचे हा अनुभव गर्द झाला असेल.

नाती बिघडली, सबंध बिघडले , वाट्याला एकटेपण आले , आता कुणाचे फोन येत नाहीत , दुखावलेले मन ‘कुणाला फोन कर’ असेही म्हणत नाही.

तरीपण एक नातं  टिकून राहते  ते नातं मुलीचं. तितक्यात मुलीचा फोन येतो , ती विचारते— “पप्पा गेले होते का दवाखान्यात ? औषधं घेतलीत का ? काय म्हणाले डॉक्टर ? जेवण झालं काय ?”नाना प्रश्न काळजीचे.आस्थेचं विचारणं, जिव्हाळ्याचं हेच एकमेव नातं.

थोडा पश्चातापही होत असतो.मुलींसाठी काहीतरी करण्यात मी कमी पडलो, त्यांच्यासाठी काहीतरी करायचे राहून गेले.कसे होणार त्यांचे ?

लोक मुलगा झाला की, स्वतःला भाग्यवंत समजतात.मला असे वाटते ,ज्यांना मुली आहेत ते खरे भाग्यवंत होत. एरवी दोन तीन मुले जेव्हा वडिलांना कुणाकडे ठेवण्यावरुन भांडत असतात, तेव्हा झालेली चूक सुधारण्यापलीकडे गेलेली असते. मुलगी म्हणते,” काळजी करू नका मी आहे.”

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शुभेच्छांचा गैरसमज… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ शुभेच्छांचा गैरसमज… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी एका मित्राला फोन केला.’ तुला नव वर्षानिमित्त हार्दीक शुभेच्छा !’ तो एकदम चक्रावून म्हणाला,’ तुला कसं कळलं माझ्याकडं वर्षा कामाला लागली म्हणून?’

त्यामुळं ‘वर्षा’बद्दलचे गैरसमज टाळण्यासाठी मी ‘ईयर’ हा शब्द वापरण्याचं ठरवलं व दुसर्‍या मित्राला फोन केला.’एंजाॅय न्यू इयर!’ तो माझ्यावर चिडलाच. नंतर मला त्याच्या चिडण्याचं कारण समजलं.

त्याला ऐकायला जरा कमी येतं. त्यामुळं त्यानं नवीन कर्णयंत्रं विकत घेऊन ती आजपासून वापरायला सुरुवात केली होती. व मी त्याला हिणवण्यासाठी ‘ Enjoy new ear’ असा फोन केल्याचं त्याला वाटलं.

या प्रसंगामुळं  मी ईयरऐवजी  ‘साल’ चा प्रयोग करायचं ठरवलं.

मी तिसर्‍या मित्राला  शुभेच्छा दिल्या ,’ तुला  साल मुबारक !’

हा मित्रही भयंकर चिडला कारण तो आजच सालीवरुन घसरुन पडला होता!

चवथ्या मित्राचंही असंच झालं.आज तोही सालीवर भयंकर चिडलेला होता आणि तोही आज सालीवर घसरला होता. कारण त्याच्या सालीनं आज त्याच्या बायकोला घरी आणून सोडलं होतं!

मग ‘साल’ ला बाद करुन सालाबादप्रमाणं एका मैत्रिणीला मी ‘नव संवत्सरकी शुभकामनाएं’ असा संदेश पाठवला . ती माझ्यावर खूपच नाराज झाली. कारण तिला एक सवत होती.तिला मी नेहमी संवत्सर (सवत+मत्सर) म्हणून चिडवायचो.माझ्या संदेशावरुन तिला ‘आणखी एखादी सवत येवो,’ अशी मी इच्छा प्रकट केल्याचा संशय आला.

शेवटी मला रशियन भाषा येत असल्यानं माझ्या रशियन अवगत असणार्‍या मैत्रिणीला मी ‘नये गोद की शुभकामनाएं’ असा मेसेज पाठवला. ती विधवा असल्यानं नवीन गोदचा प्रश्नच नाही, अशी तिची धारणा होती.रशियनमधे ‘गोद’चा अर्थ वर्ष असा होतो, हे ती विसरली होती.तिनं खूप अकांडतांडव केलं व मी दिसलो, की ती मौनव्रत धारण करायला लागली.

मला हेच कळेना नवीन वर्षाला वर्ष म्हणावं की साल म्हणावं की इयर म्हणावं  मग संस्कृतमधलं ‘संवत्सर’ व रशियनमधलं ‘गोद’ तर दूरच राह्यलं !

मग मी ‘वर्षा’चा नाद सोडला व महिन्यांवर आलो. मी माझ्या  एका मैत्रिणीला संदेश पाठवला,’ तुला येणार्‍या महिन्यांमधे अजिबात त्रास न होवो.’ तिनं फणकार्‍यानं उत्तर पाठवलं,’ माझा महिन्याचा त्रास ही माझी खाजगी बाब आहे. त्यांत तू दखल न घेणं चांगलं !’                                               

मी सर्दच झालो. तरी मी शुभेच्छा पाठवण्याचा चंगच बांधला होता. त्यामुळं मी महिन्यांच्या ऐवजी दिवसांवर यायचं ठरवलं व तिला परत लिहिलं,’ तुझा कांहीतरी गैरसमज होतोय. तुला चांगले दिवस जावोत असं मला म्हणायचं होतं.’  झालं!ती नवर्‍याला घेऊन माझ्याशी भांडायलाच आली.मी नवर्‍याला वर्ष, महिने व दिवसांचं स्पष्टीकरण दिलं तेव्हां तो म्हणतो कसा,’ आता  वर्ष, महिने वा दिवस अशी काळाची गणती सोडून द्या नाहीतर तुमची काळाशी गाठ पडेल व नंतर घटकाही मोजाव्या लागतील.’

माझ्या माय मराठीनं इथं हात टेकले. खूप विचारांती  मी  त्यातून पुढील तोडगा काढला, तो आपणा सर्वांच्याही उपयोगी पडेल .                          

‘माझ्या सर्व सुहृदांना नूतन वर्षाच्या (आपण घ्याल त्या अर्थानं) मनापासून शुभेच्छा !

लेखक : अज्ञात

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “प्रसाद” – लेखक : श्री अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “प्रसाद” – लेखक : श्री अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

एका छोट्याशा गावात गेलो होतो. निवृत्त शिक्षकाचा सत्कार होता. ग्रामस्थांनी छान तयारी केली होती. चहापाणी झाले. हाती थोडा वेळ होता. लोक जमू लागले होते.

गावातला तरुण म्हणाला, “थोडा वेळ आहे. भैरीच्या देवळात जाऊन येऊ ! माझ्या सोबत आलेल्या मित्राला देवळात जाण्याची गोष्ट फारशी आवडली नाही. त्याच्या चेहऱ्यावर दिसतच होते. मी निघालो तसा तोही निघाला. देऊळ म्हणजे खोपटेच होते.

“फार जागृत स्थान आहे, सर ! सगळे गाव मानते.”  गावातला तरुण म्हणाला. माझा मित्र कसनुसा हसला.

देवळात गेलो. मी नमस्कार केला. गुरवाने प्रसाद दिला. मी पाया पडून प्रसाद तोंडात टाकला.

मित्राच्या हातात प्रसाद तसाच होता. त्याने पहिल्यांदा वास घेतला. मग निरखून पाहिले. न खाता त्याने प्रसाद हळूच एका दिवळीत ठेवला. मी प्रदक्षिणा घातली. गुरव म्हणाला, “बरं केलं तुम्ही सत्काराला आला ते!

गुरुजी फार भला माणूस. सगळं गाव शानं केलं. कुठं अडू द्या-नडू द्या; देवासारखं गुरुजी पळत येनार. पण नशिबानं त्यांना न्याय दिला नाही!” गुरवाच्या या वाक्याने मी कान टवकारले.

गुरुजींचे जीवन समजून घेण्यासाठी गुरवाला एक-दोन प्रश्न विचारले. गुरुजींची जीवन कथा ऐकून मी स्तब्ध झालो. तरुण मुलगा अकाली गेला. लग्न झालेल्या मुलीचा संसार मोडला. मुलगी माहेरी आली.

बायकोला दोन्ही धक्क्यांनी वेड लागले. तिला सावरून, उभी करून गाडी रुळावर येत होती, तेव्हाच मुलीने जीव दिला. एकमेकांच्या आधाराने ते दोघे उभे राहिले. सारे गावच कुटुंब बनवले. गुरुजींनी केलेले कार्य मला माहीत होते, पण ही सारी दु:खभरली कहाणी माहीत नव्हती.

कार्यक्रम छान झाला.

निघताना मी आणि माझा मित्र गुरुजींचा निरोप घ्यायला मुद्दाम गेलो. मी निघताना गुरुजींना न राहवून विचारले, “हे सगळे कसे सहन केलेत?’’

गुरुजी म्हणाले, “आयुष्यात जे आपल्याला मिळते तो देवाचा प्रसाद मानला. चिकित्सा नाही. चिरफाड नाही. चिडचिड नाही.

प्रसाद हातात आला की चटकन तोंडात टाकतो की नाही आपण? चवीचा विचार नाही करत. ताजे-शिळे म्हणत नाही. त्याला पेढा, मला गूळ का? म्हणत नाही. घेतो. खातो. धन्य होतो. हे कधी विसरलो नाही. प्रसाद देवाचा प्रतिसादच मानला !’ माझे डोळे भरून आले. मी वाकून नमस्कार केला. छान हसून माझा हात हातात घेतला. स्पर्श आणि हास्याचा जणू मला त्यांनी प्रसादच दिला !

गुरुजींशी झालेल्या संवादातून केवढा हितोपदेश मिळाला;  तोही सहजच ! प्रसाद देवाचा प्रतिसाद असतो हे पटले, तर जगणे किती सुंदर बनून जाते हे मला समजले.

मंदिरात आपल्याला प्रसाद मिळतो त्याची आपण चिकित्सा राहोच, चर्चाही करत नाही. कुणाला चार शेंगदाणेच मिळतील तर कुणाला बत्तासा ! कुणाला काजूचा तुकडा असलेला शिरा मिळेल तर कुणाला करपलेल्या शिऱ्याचा लाभ होईल !

आपण प्रसाद घेतो, खातो आणि कृतकृत्यतेने हात जोडतो. देवळातल्या प्रसादासारखेच मानावेत आयुष्यातील प्रसंग !

जे वाट्याला आले ते आपल्या इष्टाचा प्रतिसाद  मानले की सारी घालमेलच संपते. गुरुजींशी झालेल्या मुक्त संवादाने मी आतून उजळून निघालो.

एकदा माझी नाशिकला भागवत कथा झाली. सांगता झाली, तेव्हा सर्वांना प्रसादही दिला.

सारी आवराआवर झाल्यावर एक वृद्धा आली. म्हणाली, “प्रसाद कधी मिळेल?’’  सारे जिकडचे तिकडे झाल्याचे तिला कळल्यावर ती खट्टू झाली.

तेवढ्यात त्या कार्यालयात असणारी एक महिला म्हणाली, “थांब मावशी. एक लाडू आहे. देते तुला !’’ वृद्धेला आनंद झाला.

बुंदीचा लाडू हातात घेऊन तिने कपाळाला लावला आणि लाडवाचा एक तुकडा घेऊन उरलेला लाडू परत देत म्हणाली,

“पुन्हा कुणी आलं तर यातला कणभर त्यालाही देता येईल. कुणी तसंच जायला नगं !

परसाद जीव निवण्यासाठी पायजे.. पोट भरण्यासाठी नाय् !’’

मला तिचे पाय धरावेसे वाटले.

आध्यात्मिकतेने अनासक्ती येते ती अशी ! मन प्रसन्न असेल ना; तर मनाने नाही, कणानेही समाधान लाभते हे त्या वृद्धेच्या संवादातून उलगडले.

परमार्थ वेगळे काय शिकवतो?

आयुष्यातला प्रत्येक क्षण भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारता आला तर सारे तणाव, सारा वैताग संपून जाईल. जगणे ‘प्रासादि’क होईल. बीजात सारा वृक्ष सामावलेला असतो, तसा कणाकणात ब्रह्मांडव्यापी आनंद कोंदटलेला असतो.

पण आपल्या हव्यासापोटी आपण ब्रह्मांडच खिशात घालायचे म्हणतो. मग हट्ट सुरू होतो. आणखी मिळवेन, खूप मिळवेन, जास्तीत जास्त मिळवेन… शेवटी ओंजळ रिक्तच राहते.

असे निराश होण्यासाठी आपल्याला आयुष्य मिळालेले नाही. खरे तर आयुष्य हाच महाप्रसाद आहे.

एकदा ते मिळाले म्हणताना, आणखी काय हवे? आता मिळवायला नव्हे तर वाटायला शिकले पाहिजे. तळहातावर मिळालेला गोपाळकाला, स्वत:साठी थोडा ठेवून कण कण सर्वांना वाटायचा असतो.

देता यायला लागले की आपणही कृष्ण होतो.

परमार्थ म्हणजे जवळचे उत्तम सर्वांना देणे. थोड्यातलाही आनंद घेणे. आपले अश्रू रोखून हसण्याचे चांदणे पसरणे. बस्स, हव्यास आणि हट्ट सोडण्याची तयारी करायला पाहिजे.

लेखक: अज्ञात

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ संबंध – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ संबंध – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

एके दिवशी मी माझ्या मित्राचा तात्काळ श्रेणीतील पासपोर्ट बनवण्यासाठी पासपोर्ट ऑफिसमध्ये गेलो होतो.

रांगेत उभा राहून आम्ही पासपोर्टचा तात्काळ फॉर्म घेतला. फॉर्म भरून आम्हाला बराच वेळ झाला होता. आता आम्हाला पासपोर्टची फक्त फी जमा करायची होती.

परंतु आमचा नंबर आल्याबरोबर क्लार्कने खिडकी बंद केली व सांगितले, “आजची वेळ संपली आहे, उद्या या.”

मी त्याला विनंती केली,  “आजचा संपूर्ण दिवस आम्ही इथे थांबलो आहोत आणि आता फक्त फी भरायची राहिली आहे, कृपया फी जमा करून घ्यावी.”

क्लार्क चिडून म्हणाला, “तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस इथं घालवला, याला मी जबाबदार आहे का? इथे सरकारने कामाकरता ज्यादा माणसे नेमली पाहिजेत. मी सकाळपासून इथे कामच तर करतोय ना.”

माझा मित्र खूपच निराश झाला, तो म्हणाला, “चल. आता उद्या परत येऊ.” मी त्याला थांबवले व म्हणालो, ” मी पुन्हा एकदा प्रयत्न करून बघतो, थांब जरा.”

क्लार्कने आपली पिशवी उचलली व तो चालू लागला. मी त्याला काही बोललो नाही, पण गुपचूप त्याच्या मागे मागे चालू लागलो. तो कॅन्टीनमध्ये गेला. त्याने आपल्या पिशवीतून जेवणाचा डबा काढला व एकटाच सावकाश जेवू लागला.

मी त्याच्या समोरच्या  बाकावर बसलो व त्याच्याशी बोलू लागलो. मी म्हणालो, “तुम्हाला तर खूप काम आहे. तुम्ही दररोज वेगवेगळ्या लोकांना भेटत असाल?” तो म्हणाला, “होय. मी तर मोठमोठ्या अधिकाऱ्यांना भेटतो. कित्येक आय. ए. एस., आय.पी.एस., आमदार रोज इथे येतात व माझ्या खुर्चीसमोर भेटण्याची वाट पाहत असतात.”

नंतर मी त्याला म्हणालो, “तुमच्या ताटलीतील एक पोळी मी खाऊ का?” तो “हो” म्हणाला. मी त्याच्या ताटलीतील एक पोळी उचलली व भाजीबरोबर खाऊ लागलो.

मी त्याच्या जेवणाचे कौतुक केले आणि म्हणालो, “तुमची पत्नी खूपच रुचकर जेवण बनवते.” त्याने फक्त माझ्याकडे पाहिलं व जेवण पुढे चालू ठेवलं.

मी त्याला म्हणालो,

” तुम्ही खूप महत्त्वाच्या पदावर आहात. खूप मोठी माणसं तुमच्याकडे येतात. तुम्ही आपल्या पदाचा (खुर्चीचा) मान राखता का? तुम्ही खूप भाग्यवान आहात की एवढी महत्त्वाची जबाबदारी तुमच्याकडे आहे, पण तुम्ही तुमच्या पदाचा मान राखत नाही.”

तो मला म्हणाला, “तुम्ही असं कसं  म्हणू शकता ?”

मी म्हणालो, ” तुम्हाला तुमच्या कामाबद्दल आस्था असती, तर तुम्ही इतके कठोर वागला नसता.

बघा. तुम्हाला कोणी मित्रही नाहीत. ऑफिसच्या कँटीनमधे तुम्ही एकटेच जेवत बसला आहात. ऑफिसमधे पण आपल्या खुर्चीवर देखील तुम्ही उदास बसलेले असता. लोकांची कामं पूर्ण करण्याऐवजी तुम्ही अडथळा आणण्याचा प्रयत्न करता.

बाहेरगावाहून लोक येतात, सकाळपासून काम होण्याची वाट पाहून कंटाळलेले असतात. तुम्हाला ते पुन्हा पुन्हा विनंती करतात आणि तुम्ही त्यांना कठोरपणे म्हणता,’सरकारला सांगा, कामासाठी जादा माणसं नेमा.’

अरे! जादा माणसं नेमली तर तुमचे महत्त्व कमी नाही का होणार? कदाचित हे कामही काढून घेतले जाईल.

आपापसातील संबंध वाढविण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली आहे. पण तुमचं दुर्दैव की याचा फायदा घेण्याऐवजी तुम्ही संबंध बिघडवत आहात. मला काय, मी उद्या येईन, परवा येईन.

पण तुम्हाला चांगली संधी आली होती कुणावर तरी उपकार करण्याची… ती संधी तुम्ही घालवलीत.

मी म्हणालो, “तुम्ही पैसा तर भरपूर मिळवाल पण नातेसंबंध जपले नाहीत तर सगळं व्यर्थ आहे.

काय करणार पैशांचं ? तुमच्या रुक्ष वर्तनाने तुमची घरची माणसे पण दुरावतील आणि आधीच तुम्हाला मित्र पण नाहीत.”

माझ बोलणं ऐकल्यानंतर तो रडवेला झाला. तो म्हणाला, “साहेब, आपण खरं बोललात. खरोखरच मी एकटा आहे. बायको भांडण करून माहेरी गेलीय. मुलांनाही मी आवडत नाही. आई आहे, पण तीही माझ्याशी जास्त बोलत नाही. सकाळी ती चार पाच पोळ्या करून देते आणि मी एकटाच जेवण करतो. रात्री घरीसुद्धा जावसं वाटत नाही. समजत नाही की माझं कुठं चुकतंय?”

मी त्याला शांतपणे सांगितलं, “लोकांशी चांगले संबंध ठेवा. कोणाला मदत करता येत असेल तर करा. बघा. इथे मी माझ्या मित्राच्या पासपोर्टसाठी आलो आहे. माझ्याजवळ माझा पासपोर्ट आहे, पण माझ्या मित्राला मदत म्हणून मी तुम्हाला निरपेक्षपणे विनंती करतोय. त्याच्यासाठी धडपडतोय. म्हणून मला मित्र आहेत, तुम्हाला नाही.”

तो उठला व म्हणाला, “या माझ्या खिडकीसमोर. तुमचा फॉर्म मी आजच जमा करतो.” त्याने आमचे काम केले. नंतर त्याने माझा फोन नंबर मागितला, मीपण दिला.

मध्ये कित्येक वर्षे गेली….

अचानक रक्षाबंधनाच्या दिवशी एक फोन आला…

“साहेब, मी रविंद्रकुमार चौधरी बोलतोय. काही वर्षांपूर्वी तुम्ही तुमच्या मित्राच्या पासपोर्टसाठी आला होतात आणि माझ्या बरोबर जेवलापण होतात. त्यावेळी तुम्ही मला सांगितले होते की पैशांऐवजी नातेसंबंध जोडा. “

“हां हां ,चौधरी साहेब, आठवलं.बोला, कसे आहात तुम्ही?”

खुश होऊन तो म्हणाला, “साहेब, त्यादिवशी आपण निघून गेलात. मग मी खूप विचार केला. मला जाणवलं की खरोखर पैसे तर बरेच लोकं देऊन जातात, पण आपल्याबरोबर जेवणारा एखादाच भेटतो. दुसऱ्या दिवशी मी पत्नीच्या माहेरी गेलो व तिला आग्रह करून घरी घेऊन आलो. ती तयारच नव्हती. ती जेवायला बसली होती. तेव्हा मी तिच्या ताटातील एक पोळी उचलली व तिला म्हणालो,’ मला पण खाऊ घालशील का?’

ती चकित झाली, रडायला लागली. माझ्याबरोबर येण्यास तयार झाली. मुले पण आली.

साहेब, आता मी नुसता पैसे नाही कमवत..नाती जोडतो.

साहेब, आज तुम्हाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्याकरता फोन केला. कारण तुम्ही मला माणसं कशी जोडायची ते शिकवलं.

पुढच्या महिन्यात माझ्या मुलीचे लग्न आहे. तुम्हाला यावं लागेल, मुलीला आशीर्वाद द्यायला. आमच्याशी संबंध जोडलाय तुम्ही.”

तो बोलत राहिला, मी ऐकत राहिलो. मला वाटलं नव्हतं की त्याच्या जीवनात पैशांपेक्षा नातेसंबंधाना इतके महत्त्व प्राप्त होईल.

मित्रांनो, माणूस भावनेवर जगत असतो, नियमांवर नाही. नियमांवर तर मशीन चालतात.

लेखक – अज्ञात 

प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆’जिप्सी’ला सलाम – संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘जिप्सी’ला सलाम – संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

अरुण दातेंनी सांगितलेली एक हृद्य आठवण-

“मला एकदा अचानक मंगेश पाडगावकरांचा फोन आला. ते म्हणाले, “मी एक नवीन कोरं गाणं लिहिलं आहे. अजून कागदावरची शाईसुद्धा वाळलेली नाही. मी तुला फोन करण्याच्या पाच मिनिटं आधी देवसाहेबांशी बोललो आणि त्यांना गाणं ऐकवलं. आम्ही दोघांनीही हे ठरवलं आहे की, या गाण्याला फक्त तूच न्याय देऊ शकतोस.”ते गाणं म्हणजे, ‘या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे’! हे गाणं गाऊन माझी प्रसिद्धी तर वाढलीच, पण माझ्या चाहत्यांप्रमाणे मलाही हे गाणं बरंच काही शिकवून गेलं.

या गाण्याची एक आठवण फारच हृद्य आहे. तो विलक्षण अनुभव आपल्याला सांगावासा वाटतो.

माझ्या नाशिकच्या एका कार्यक्रमामध्ये मध्यंतरात माझा बालपणीचा मित्र आणि साहित्यिक वसंत पोतदार मला भेटायला आला. त्याच्याबरोबर एक तरुण मुलगाही होता. त्याला पुढे करून वसंता मला म्हणाला, ‘‘या मुलाला दोन मिनिटे स्टेजवर काही बोलायचे आहे.’’ त्यावर मी त्याला म्हणालो की, ‘‘मी याला ओळखत नाही आणि तो काय बोलणार आहे, हे मला माहीत नाही. त्यामुळे मी परवानगी कशी देऊ?’’ यावर वसंता मला पुन्हा म्हणाला, ‘‘माझ्यावर विश्वास ठेव, त्याला जे बोलायचे आहे, ते फार विलक्षण आहे आणि ते लोकांपर्यंत पोहोचावे अशी माझी इच्छा आहे.’’ मी म्हटले, ‘‘ठीक आहे, मी त्याला पाच मिनिटे देतो. कारण रसिक गाणी ऐकायला थांबले आहेत.’’

वसंता त्याला घेऊन स्टेजवर गेला आणि त्या मुलाने बोलणे सुरू केले. ‘‘जवळपास एक ते दीड महिन्यांपूर्वीपर्यंत मी पूर्णपणे ड्रग्जच्या आहारी गेलेला मुलगा होतो. ड्रग्जशिवाय मला कुठलेही आकर्षण उरले नव्हते. अगदी आयुष्याचेसुद्धा! असाच एकदा कासावीस होऊन एके सकाळी मी ड्रग्जच्या शोधात एका पानाच्या दुकानाशी आलो. तेव्हा माझ्या कानावर एका गाण्याचे शब्द पडले. ते संपूर्ण गाणे मी तसेच तेथेच उभे राहून ऐकले आणि ड्रग्ज न घेता किंवा त्याची विचारपूसही न करता तिथून निघालो. एका कॅसेटच्या दुकानाशी येऊन दुकान उघडण्याची वाट बघत राहिलो. दुकान उघडताक्षणी मी पाच मिनिटांपूर्वी ऐकलेल्या गाण्याची कॅसेट विकत घेतली. दिवसभरात तेच गाणे किमान ५० वेळा ऐकले आणि पुढचे १०-१२ दिवस हेच करत राहिलो. त्यानंतर वसंत काकांकडे गेलो आणि त्यांना म्हटले की, ‘कुठल्याही परिस्थितीत या गाण्याचे गायक अरुण दाते साहेबांना मला भेटायचे आहे.’ काका म्हणाले, ‘अजिबात चिंता करू नकोस. पुढल्या महिन्यात अरुणचा कार्यक्रम नाशिकमध्ये आहे. आपण त्याला भेटायला जाऊ.’ ज्या गाण्याने माझे संपूर्ण आयुष्य पालटले आणि मी स्वत:चे माणूसपण शोधायला लागलो, ते गाणे आहे,  ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ आणि त्याकरिताच मी सर्वांसमोर दाते साहेबांचे मुद्दाम आभार मानायला आलो आहे.’’

त्या मुलाचे बोलणे झाल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. त्या दिवशीची सगळ्यात मोठी दाद त्या मुलाच्या बोलण्याला मिळाली होती.

मला वसंताने स्टेजवर बोलावले आणि त्या मुलाने अक्षरश: माझ्या पायावर लोटांगण घातले. मी त्याला उठवून प्रेमाने जवळ घेतले आणि माईक हातात घेऊन रसिकांना आणि त्याला म्हणालो, ‘‘जे श्रेय तू मला देतो आहेस त्याचे खरे हकदार कविवर्य मंगेश पाडगावकर आणि संगीतकार यशवंत देव आहेत. मी तर या गाण्याचा फक्त गायक आहे. म्हणून मी मुंबईला गेल्यावर तुझे हे धन्यवाद त्या दोघांपर्यंत नक्की पोहोचवीन.’’

लेखक  :अज्ञात

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दोन डोळे आणि तीस म्हणी… ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ दोन डोळे आणि तीस म्हणी… ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

दोन डोळे आणि तीस म्हणी … 

पहा माय मराठीची समृद्धी …. 

१.डोळा लागणे (झोप लागणे)

२.डोळा मारणे (इशारा करणे)

३.डोळा चुकवणे (गुपचूप जाणे)

४.डोळे येणे (नेत्रविकार होणे)

५.डोळे जाणे (दृष्टी गमावणे)

६.डोळे उघडणे (सत्य उलगडणे)

७.डोळे मिटणे (मृत्यू पावणे)

८.डोळे खिळणे (एकटक पाहणे)

९.डोळे फिरणे (बुद्धी भ्रष्ट होणे)

१० डोळे दिपणे (थक्क होणे)

११.डोळे वटारणे (नजरेने धाक दाखवणे)

१२.डोळे विस्फारणे (आश्चर्याने पाहणे)

१३.डोळे पांढरे होणे (भयभीत होणे)

१४.डोळे भरून येणे (रडू येणे)

१५.डोळे भरून पाहणे (समाधान होईपर्यंत पाहणे)

१६.डोळे फाडून पाहणे (आश्चर्याने निरखून पाहणे)

१७.डोळे लावून बसणे (वाट पाहात राहणे)

१८.डोळेझाक करणे (दुर्लक्ष करणे)

१९.डोळ्यांचे पारणे फिटणे (पूर्ण समाधान होणे)

२०.डोळ्यात प्राण आणणे (आतुरतेने वाट पाहणे)

२१.डोळ्यात धूळ फेकणे (फसवणूक करणे)

२२.डोळ्यात तेल घालून बघणे (लक्षपूर्वक पाहणे)

२३.डोळ्यात डोळे घालून पाहणे (एकमेकांकडे प्रेमाने बघणे)

२४.डोळ्यात सलणे/खुपणे (दुसऱ्याचं चांगलं न बघवणे)

२५.डोळ्यात अंजन घालणे (दुसऱ्याला परखडपणे त्याची चूक दाखवून देणे)

२६.डोळ्यांवर कातडे ओढणे (जाणूनबुजून दुर्लक्ष करणे)

२७.डोळ्याला डोळा नसणे (काळजीमुळे झोप न लागणे)

२८.डोळ्याला डोळा भिडवणे (नजरेतून राग व्यक्त करणे)

२९.डोळ्याला डोळा न देणे (अपराधी भावनेपोटी एखाद्याच्या नजरेस नजर न मिळवणे)

३०.दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसणे ; पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ न दिसणे (दुसऱ्याची छोटीशी चूक दिसणे ; पण स्वतःची मोठी चूक न दिसणे)

प्रस्तुती : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बाईचा न दिसणारा संसार –‘कालनिर्णय’… लेखिका : अनामिक ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

? वाचताना वेचलेले ?

🍃 बाईचा न दिसणारा संसार –‘कालनिर्णय’… लेखिका : अनामिक ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

आईनं रबरबॅन्डमध्ये रोल केललं कालनिर्णय कपाटातून बाहेर काढलं… देवासमोर ठेऊन त्याला हळद कुंकू वाहत नमस्कार केला आणि दरवर्षीप्रमाणं ते फ्रिजजवळच्या भिंतीवर लटकवलं. आई दरवर्षी हे असं करते… मनात प्रश्न आला… काय आहे या साध्या बारा कागदांमध्ये… म्हणून गेल्या वर्षीचं कालनिर्णय चाळत बसलो…

आईनं गॅस सिलेंडर लावलेली तारीख, बाबांच्या पगाराची तारीख, ताईची पाळी, किराणा भरल्याची तारीख व पैसे, दादाची परिक्षा, बचत गटात पैसे भरलेली तारीख, भिशी, दूध, पेपर व लाईट बिल भरल्याची तारीख, ईएमआयची तारीख, घरकाम करणा-या ताईंचे खाडे यासारख्या ब-याच गोष्टींच्या नोंदी होत्या या कालनिर्णयमध्ये… अगदी मावशीच्या मुलाच्या लग्नतारखेपर्यंत…

डिजीटल कॅलक्युलेटर जरी आकडेमोड करत असलं तरी महिनाभराचं आर्थिक नियोजन याच कागदी कालनिर्णयवर उमटत असतं. गरोदर महिलेच्या चेकींगची तारीख, नंतर तिच्या बाळंतपणासाठी हॉस्पिटलमध्ये नाव नोंदवल्याची तारीख ते अगदी बाळंतीण झाल्याचा दिवसही या कालनिर्णयमध्ये लिहून ठेवला जातो…

दहावी बारावी बोर्डाचं टाईमटेबल शाळेतून मिळाल्यावर ते घरी आल्या आल्या या कालनिर्णयवर नोंदवण्याची आमच्यात प्रथा असे… अगदी शाळेत दांडी ज्या दिवशी मारली ती तारीख ते लायब्ररीतून घेतलेलं पुस्तक परत करण्याची तारीख याची नोंद आर्वजून या कालनिर्णयवर व्हायची. सहकुटूंब बाहेर फिरायला जायचं म्हटलं तरी बिचा-या या कालनिर्णयला एक तास चर्चा ऐकावी लागे…

काही घरांमध्ये आजी आजोबांच्या औषधाच्या वेळाही कालनिर्णयवर पाहायला मिळतात. गंमत म्हणजे नवं कालनिर्णय आल्यावर घरातल्यांचे वाढदिवस कोणत्या वारी आलेत, हे पाहण्याचा एक जणू इव्हेंटच असतो. श्रावण, मार्गशीर्षातले उपवास यांचं एक वेगळंच स्थान या कालनिर्णयवर असतं. का कुणास ठाऊक पण संकष्टी चतुर्थी, आषाढी एकादशी, गणेशोत्सव, रक्षाबंधन, नवरात्रौत्सव, दसरा, दिवाळी, होळी, संक्रांत यासारखे दिवस व सण कालनिर्णयमध्ये एकदा पाहूनही मन भरत नाही, ते पुन्हा पुन्हा पाहण्यात एक वेगळंच समाधान वाटतं.

हातात स्मार्टफोन, एक चांगली डायरी घरी असूनही गृहिणी अशा कालनिर्णय का लिहीत असतील बरं… कालनिर्णयचं निरीक्षण केल्यावर उत्तर मिळतं… डोळ्यांसमोर राहणारं शाश्वत असतं म्हणतात, तसंच काही गोष्टी परंपरागत आहेत… गृहिणी घरात ज्या ठिकाणी जास्त असते त्या स्वयंपाकगृहातच अधिककरून हे कालनिर्णय लावलं जातं. याच कालनिर्णयकडं पाहत एकीकडे बाईच्या मनात आठवड्याभराचं सारीपाट मांडणं सुरु असतं आणि दुसरीकडे तितकाच चोख स्वयंपाक सुरु असतो… या दोन्हीमध्ये गल्लत मुळीच होत नाही…

या कालनिर्णयकडे पाहिल्यावर असं वाटतं घरातल्या प्रत्येकाच्या सुख दुःखाची, चांगल्या वाईट परिस्थीतीची नोंद घेण्याची जबाबदारीच जणू या कॅलेंडरनं आपल्याकडे घेतलीये. कदाचित काही महिलांना या कालनिर्णयकडे पाहिल्यावर काहीसा आधारही वाटत असेल… इवल्याशा हुकवर वर्षभर लटकणारं हे कालनिर्णय पाहिल्यावर कदाचित अनेकांना बळही मिळत असेल…

इतक्यात आतून आईचा आवाज आला, “कालनिर्णय टाकून नको रे देऊ ते… इतक्यात नसतं टाकायचं… ” मला हसू आलं… पण खऱं सागू… ज्या कालनिर्णयवर वर्षभराच्या सुख दुःखाच्या, प्रत्येक घटनेच्या नोंदी झाल्या त्या कालनिर्णयविषयी आईच्या मनात हा जिव्हाळा निर्माण होणं स्वाभाविक आहे…

२०२३ चं कालनिर्णय पुन्हा रोल करून त्याला रबरबॅन्ड लावला. त्यावेळी जाणीव झाली आपल्या हातात आहेत, ते फक्त साधे बारा कागद नव्हे तर, बाईचा न दिसणारा संसार आहे… 

लेखिका : अनामिक

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मनोरुग्णांचा कुंभमेळा… — लेखक : प्रा.विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ मनोरुग्णांचा कुंभमेळा… — लेखक : प्रा.विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

तुमचं नातं कितीही जवळचं असो….

जाणं येणं कमी झालं .. गाठीभेटी कमी झाल्या .. संवाद होईनासा झाला की प्रेमाला , आपुलकीला ओहटी लागणारच !

शेअरिंग झाल्याशिवाय , दुःख सांगून रडल्याशिवाय कुणीही कुणाचं होऊच शकत नाही !

 

आणि हल्ली हेच होईनासे झाले आहे

किंवा कमी कमी होत होत बंद होण्याच्या मार्गावर आहे !

आपल्याच हाताने आपल्या जवळच्या नात्याला जर तुम्ही अग्नी देणार असाल तर जगण्यामध्ये उदासीनता , डिप्रेशन , भकास वाटणे हे होणारच !

नको तितकी आर्थिक संपन्नता आणि प्रमाणाच्या बाहेर प्रॉपर्टी गोळा करण्याच्या विळख्यात माणूस सापडला की जगण्यातला आनंद , मजा संपणारच !

 

म्हणून Hi , Hello वाली मंडळी जमा करण्यापेक्षा माणसं जपा , नाती जगा !

सुखदुःखात साथ देणारे दोन चार मित्र , हाकेला धावून येणारे सख्खे शेजारी आणि वेळ प्रसंगी धाऊन येणारी चार रक्ताची नाती जर आपल्या जवळ असतील , तर आणि तरच आपले जगणे सुसह्य होऊ 

शकते , नसता मनोरुग्णाच्या कुंभमेळ्यातले आपणही एक मनोरुग्ण व्हायला वेळ लागणार नाही !

 

मी आणि माझं कुटुंब इतक्या छोट्या वर्तुळात आपण ” सुख मिळवण्याचा ” प्रयत्न करत असाल तर आपल्या प्रयत्नांना तडे जाऊ शकतात !

एखाद्या विषयातलं जबरदस्त टॅलेंट , त्याच्या पोटी मिळणारे गलेलठ्ठ पॅकेज ,उच्चभ्रू  सोसायटीतला वेल फर्निशड् फ्लॅट आणि पार्किंग मध्ये असलेली चकचकीत गाडी म्हणजे सुख , या भ्रमातून बाहेर पडा !

काही नाती तरी जपा .. कुणाकडे तरी जात जा .. कोणाला तरी बोलवत जा

आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे व्यक्त न होता , दुःख न सांगता कुढण्यापेक्षा जे आहे ते सांगून मस्तपैकी मोकळं रडा !

…. लक्षात घ्या खळखळून हासल्याशिवाय आणि मोकळं रडल्याशिवाय तुम्ही तणावमुक्त होऊच शकत नाही . भावनांचा निचरा झाल्याशिवाय टेन्शन कमी होणारच नाही आणि त्याशिवाय माणूस आनंदी राहूच शकणार नाही .

 

आणि दुसरी महत्वाची गोष्ट …

…. आपलं समजून तुमच्याजवळ जर कुणी मन मोकळं केलं तर त्याचे गॉसिपिंग करू नका , पाठ वळली की त्या व्यक्तीला हसू नका !

…. इतरांना कुत्सितपणे हसण्याची आणि पदोपदी दुसऱ्याला टोमणे मारण्याची सवय लागली की आपल्या मनाला झालेला कॅन्सर थर्ड स्टेजला गेला आहे , असे समजण्यास काहीच हरकत नाही.

लेखक : प्रा.विजय पोहनेरकर

मो 94 20 92 93 89

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “गावठी !!!! –” लेखिका : सुश्री संध्या साठे जोशी ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? वाचताना वेचलेले ?

☆ “गावठी !!!! —” लेखिका : सुश्री संध्या साठे जोशी ☆ श्री सुनील देशपांडे ☆

आम्ही मातीच्या भिंती 

आणि शेणाने सारवलेल्या 

जमिनीच्या घरात रहायचो…

 

‘ते’ सिमेंटच्या भिंती आणि 

चकचकीत टाईल्स लावलेल्या 

घरात रहायचे… 

आणि 

आम्हाला गावठी म्हणायचे…!

 

आम्ही कोंड्याच्या रांगोळीत मीठ कापूर मिसळून 

त्या पावडरने दात घासायचो…

‘ते’ चकाचक वेष्टणात मिळणाऱ्या 

पांढऱ्या टूथपेस्टने दात घासायचे…

आणि 

आम्हाला गावठी म्हणायचे…!

 

आम्ही जात्यावर धान्य दळायचो 

आणि पाट्यावरवंट्यावर 

चटण्या वाटायचो…

‘ते’ आयतं किंवा गिरणीवरुन 

पीठ दळून आणायचे,

मिक्सरात चटण्या वाटायचे…

आणि

आम्हाला गावठी म्हणायचे…!

 

आम्ही तांब्यापितळेच्या 

कल्हई लावलेल्या भांड्यातून 

चुलीवर शिजवलेलं जरा धुरकट वासाचं अन्न खायचो…

 

‘ते’ गॅसवर स्टीलच्या 

चकचकीत भांड्यात शिजवलेलं अन्न खायचे…

आणि 

आम्हाला गावठी म्हणायचे…!

 

आम्ही हातसडीच्या तांदळाचा भात 

आणि नाचणीची भाकरी …. लसणीच्या चटणीबरोबर हाणायचो…

‘ते’ शुभ्र पांढऱ्या तांदुळाचा भात अन् गव्हाची पोळी 

तुपसाखरेबरोबर खायचे ……

आणि 

आम्हाला गावठी म्हणायचे…!

 

आम्ही घाण्यावरुन काढून आणलेलं 

तेल वापरायचो…

‘ते’ डबल रिफाइंड तेल वापरायचे ……

आणि

आम्हाला गावठी म्हणायचे…!

 

आम्ही साधे सुती कपडे वापरायचो…

‘ते’ टेरिलीन टेरिकाॅट वापरायचे…

आणि 

आम्हाला गावठी म्हणायचे…!

 

आमच्या घरी न्हावी यायचा,

मागीलदारच्या पडवीत पाटावर बसून 

थोरापोरांचे केस कापायचा…

‘ते’ मागेपुढे आरसेवाल्या सलुनात 

खुर्चीत बसून केस कापून घ्यायचे…

आणि

*आम्हाला गावठी म्हणायचे…!

 

काळ बदलला…

 

‘ते’ करायचे त्या सगळ्या गोष्टी 

सोसासोसाने आम्ही पण करु लागलो…

 

आता ‘ते’ दामदुप्पट रकमा मोजून 

मन्थेंडांना आणि वीकेन्डांना 

मुद्दाम मातीच्या घरात 

रहाण्याची चैन करतात…

 

चुलीवर शिजवलेलं 

धुरकट वासाचं .. (साॅरी स्मोकी फ्लेवरचं)

अन्न आवडीने खातात…

घरी रिफाइंड तेलाऐवजी 

‘कोल्ड प्रेस’वर काढलेलं 

महागडं तेल वापरतात…

 

हौसेने नाचणीची बिस्कीटं खातात…

नमकवाल्या टूथपेस्टा वापरतात…

महागड्या ब्रॅन्डांचे 

सुती कपडे वापरतात…

आणि 

आणि आम्हाला गावठी म्हणतात…!!!

 

लेखिका :  संध्या साठे-जोशी, चिपळूण. 

प्रस्तुती : श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares